मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ प्रवास पुस्तकाचा… सादर नमन… — हिन्दी लेखक : श्री. प्रदीप शर्मा ☆ भावानुवाद – सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

? इंद्रधनुष्य ?

☆ प्रवास पुस्तकाचा… सादर नमन… — हिन्दी लेखक : श्री. प्रदीप शर्मा ☆ भावानुवाद – सुश्री प्रभा हर्षे  ☆

एखाद्या पुस्तकाचा प्रवास खरंतर तेव्हा सुरू होतो, जेव्हा एखादा वाचक ते पुस्तक वाचायला सुरुवात करतो. या प्रवासाची सुरुवात कुठूनही कशीही होऊ शकते.. कधी ठरवून तर कधी अचानक… कधी स्टडी रूममधून.. कधी बेडरूम मधून.. तर कधी लायब्ररीमधून. इतकंच नाही तर कधी ऑफिसमध्ये

किंवा कॉलेजमध्ये कुणाच्या लक्षात येऊ न देता.. इतरांचा डोळा चुकवून ! नाहीतर मग ट्रेनच्या लांबच्या प्रवासाच्या साथीने…

आणि पुस्तक वाचण्याची प्रत्येकाची पध्दतही अगदी वेगळी असते. काहीजण फक्त पानं चाळून बघतात, काहीजण फक्त काही पाने वरवर वाचून मजकुराचा अंदाज घेतात.. काहीजण ‘फक्त’ ते पूर्ण वाचतात. आणि अगदी मोजकेच वाचक असे असतात की जे पुस्तक अगदी मनापासून.. चवीने परत परत वाचतात.. ते पूर्ण समजेपर्यंत.. मनाचे समाधान होईपर्यंत वाचतात.!

पुस्तकाची मजा कशी घ्यायची हे खरंच वाळवीकडून शिकावं ! काही जण अगदी ‘ पुस्तकातला किडा ‘ म्हणावेत असे असतात, तर काही जण पुस्तकांवर अगदी मनापासून खूप प्रेम करतात … इतकं प्रेम की त्यांची नसलेली.. इतरांकडची पुस्तकेही त्यांना आपलीच वाटतात.. त्यांच्या घरातल्या पुस्तकांना ते वर्तमान पत्राइतकीच किंमत देतात आणि परक्यांच्या पुस्तकांवर मात्र जणू स्वतःचाच हक्क असल्याचे समजतात.

त्यांना दुसऱ्याची पुस्तके हडप करण्याचा जणू छंदच असतो. पुस्तकप्रेमी माणसांना पुस्तक मागायला लाज वाटता कामा नये, असा एक समज आहे. स्वतः विकत घेतलेल्या पुस्तकांना स्वतःची वैयक्तिक लायब्ररी म्हटले जाते.. मग ती पुस्तके कुणी वाचो किंवा न वाचो. पण चांगल्यातली चांगली आणि महागातली महाग पुस्तके स्वतः विकत घेणे हीच खरं म्हणजे सुशिक्षित आणि बुद्धिजीवी माणसाची ओळख ठरते.

एखाद्याने पुस्तक स्वतः खरेदी केलेलं आहे की दुसऱ्या कुणाकडून मागून आणलंय हे ते पुस्तक स्वतः कधीच कुणाला सांगत नाही. त्याच्या मालकाने त्याला कधी हात तरी लावलाय का हेही रहस्य ते बिचारे पुस्तक कधीच कुणाला सांगत नाही. काही बिचारी दुर्दैवी पुस्तके तर कुणी आजवर हातातही घेतलेली नाहीत हे त्यांच्या चिकटलेल्या पानांवरुन समजते. पण असे ‘ कुमारी ’.. ‘ अछूत ’ पुस्तक जेव्हा एखादा सच्चा पुस्तकप्रेमी हातात घेतो तेव्हा ती चिकटलेली पानं फडफडायला लागतात… जणू त्यांचं भाग्य उजळलेलं असतं.

कुठलंही पुस्तक आकाशातून पडावं इतक्या सहजपणे जन्माला येत नाही. प्रत्येक पुस्तकाच्या जन्माची स्वतःची अशी एक वेगळीच… विशेष अशी कथा असते. प्रत्येक पुस्तक ही कुणाची तरी कलाकृती असते … त्याचाही कुणीतरी रचनाकार असतो … निर्माता असतो. त्या रचनेला कुणी लेखक शब्दरूप देतो आणि त्यालाही ‘ सृजनाची प्रक्रिया ‘ असंच म्हटलं जातं. जेव्हा त्याची ती रचना पुस्तकरूपात प्रकाशित होऊन वाचकांपर्यंत पोहोचते तेव्हा लेखकाच्या अनेक वर्षांच्या तपस्येचं ते फळ असतं.

तो लेखकच त्याच्या रचनेला एक नाव देतो. ‘ हा मुलगा कुणाचा आहे ‘ ही ओळख जशी सांगितली जाते, तशीच ओळख त्या पुस्तकाची असते … ‘ ज्याने लिहिले त्याचे पुस्तक ‘. ‘ छान आहे हे पुस्तक – लेखक कोण आहे ?’ असेच विचारले जाते. ते पुस्तक प्रकाशकाचं नसतं … विकत घेणाऱ्याचं नसतं … आणि वाचकालाही ते वारसाहक्काने मिळालेलं नसतं. ते एका लेखकाचं …त्याच्या मेहनतीचं फळ असतं … त्याने कितीतरी वर्षं पाहिलेलं स्वप्न असतं ते.

प्रत्येक पुस्तक एका सूज्ञ वाचकापर्यंत पोहोचावं हाच त्या पुस्तकाचा अंतिम उद्देश असतो. धनवान लोकांच्या अति महागड्या वस्तूंनी गच्च भरलेल्या शेल्फातल्या त्या वस्तूंप्रमाणे, ती पुस्तकेही पुस्तकांच्या दुकानांची.. ग्रंथालयांची किंवा एखादाच्या घरातल्या पुस्तकाच्या कपाटाची केवळ शोभा वाढवण्यासाठी साठवलेली असू नयेत….. लक्ष्मीला कुठे जखडून ठेवलेले असते ते सगळेच जाणतात.

सरस्वतीचं वाहन आहे ‘हंस‘… आणि नीर क्षीर विवेकाचं प्रतीक अशी त्याची ओळख आहे. पुस्तकं म्हणजे ज्ञानाचं भांडार तर आहेच, पण असंख्य गोष्टी स्वतः आपणहून शिकण्यासाठीचा तो सर्वश्रेष्ठ पर्याय आहे हे ध्यानात ठेवायलाच हवे. … सरस्वतीला कधीच कैदेत जखडून ठेऊन चालणार नाही …. त्यामुळे पुस्तकांचा प्रवास अविरत सुरू रहायला हवा.

एक प्रगल्भ वाचकच कुठल्याही चांगल्या पुस्तकाचे ‘ वाहन ‘ होऊ शकतो …. सरस्वतीच्या हंसासारखा ….

हे वीणावादिनी … असा वर दे … वर दे.. !! 

मूळ हिंदी लेखक : श्री. प्रदीप शर्मा 

प्रस्तुती : सुश्री प्रभा हर्षे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “जबरा पहाडिया – ऊर्फ तिलका मांझी” ☆ सुश्री शोभा जोशी ☆

सुश्री शोभा जोशी 

? इंद्रधनुष्य ?

☆ “जबरा पहाडिया – ऊर्फ तिलका मांझी☆ सुश्री शोभा जोशी ☆

‘स्वातंत्र्याशिवाय जगणे म्हणजे आत्म्याशिवाय शरीर होय ‘असं अमेरिकन फिलाॅसाॅफर खलिल जिब्राननी म्हटलं आहे. इंग्रजांनी आपल्या देशाच्या आत्म्यावरच घाला घातला होता. त्याला इंग्रजांच्याआधिपत्याखालून मुक्त करण्यासाठी म्हणजेच देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी जनजातीतील सुध्दा हजारो लोकांनी प्राणांचे बलिदान दिले. तिलका मांझी हा असाच एक जनजातीतील स्वातंत्र्य सेनानी ज्यानं देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणांचं बलिदान दिलं.

ईस्ट इंडिया कंपनीने बादशहा शाहआलमकडून बंगाल, बिहार व ओरिसा या प्रांतांची दिवाणीची सनद मिळविली. तो १८व्या शतकाचा उत्तरार्ध होता. त्या काळापर्यंत भारतीय राजे जनजातींकडून महसूल वसूल करित नसत. पण जनतेचे अधिकाधिक शोषण करण्यासाठीच इंग्रजांनी भारतीय जनतेवर जबरदस्त महसूल लादला. त्यामुळे त्या भागातील सर्व जमातीच्या लोकांनी इंग्रज सत्तेविरूध्द लढे दिले. इंग्रजांनी, भारताच्या पूर्व व दक्षिण भागातील प्रदेश सर्वप्रथम गिळंकृत केल्याने याच भागातील भारतियांनी सर्वप्रथम त्यांना विरोध केला. म्हणून या भागातील क्रांतीवीर आद्यक्रांतीकारक ठरतात. त्यातील तिलका मांझी हा इंग्रजांविरूध्द लढणारा पहिला क्रांतिकारक ठरला.

बिहारच्या, बंगालला लागून असलेल्या राजमहल व भागलपूरमधल्या पहाडातील संथाल जमातीचा तिलका मांझी हा एक बहाद्दूर, शूरवीर व कुशल संघटक होता. त्याने या प्रदेशातील हिंदू-मुस्लीमांसह अन्य जातींमधीलही लढवय्यांचे उत्तम संघटन करून इंग्रजी सत्तेशी प्राणपणाने टक्कर देऊन आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली.

तिलकाचा जन्म ११ फेब्रुवारी १७५० रोजी सुलतानगंज ठाण्याअंतर्गत तिलकपूर या गावी, संथाल जमातीतील मुर्मू समाजात झाला.

डोंगर दर्‍यातील निवासामुळे त्याचे शरीर दणकट बनले होते. त्याच्या अंगी असलेल्या ताकदीमुळे त्याला जबरा पहाडिया म्हणत. परंपरागत शिकारीचा व्यवसाय असल्याने तो नेमबाजीत तरबेज तसेच धाडसी होता. त्याच्या अंगी एक अध्यात्मिक शक्ती होती. ती त्याला कशी प्राप्त झाली माहित नाही. पण तो जे म्हणेल तसेच घडून येई असं म्हणतात. त्याच्या सात्विक जीवनपध्दतीमुळे तरूणांचा त्याच्याकडे सतत ओढा असायचा. त्याच्या अंगी असलेल्या अध्यात्मिक शक्तीमुळे लोकांची त्याच्यावरची श्रध्दा वाढू लागली. कोणत्याही जाती धर्माच्या लोकांविषयी त्याच्या मनात भेदभाव नव्हता. लोकांचा छळ करणार्‍या इंग्रजांना आपल्या प्रदेशातून हाकलून द्यायचा त्याने दृढसंकल्प केला.

भागलपूर मध्ये, आपल्या संकल्पपूर्तीसाठी तो तरूणांच्या गुप्त सभा घ्यायचा. ‘ एकी हेच बळ ‘हे त्याला माहित होतं म्हणून आदिवासी हिंदू व मुसलमानांचे त्याने एक उत्तम संघटन केले. ते सर्व लोक लहानपणापासूनच निशाणबाजीत तरबेज होते. वनवासींची जमीन, शेती, जंगलं, झाडं यावर इंग्रजांनी अधिकार गाजवायला सुरूवात केली होती.

इंग्रज, त्यांचे दलाल, जमीनदार, सावकार हे सर्व मिळून करीत असलेल्या शोषणाविषयी तिलकाने लोकांमध्ये जागृती निर्माण केली आणिाइंग्रजांना आपल्या देशातून हाकलून लावायचे याविषयी त्यांची मने तयार केली.

 गंगेच्या काठच्या प्रदेशातून मार्गो व तेलियागदी या दर्‍यांमधून येणारा जाणारा इंग्रजांचा खजिना लुटून गोरगरीबांच्यात वाटून टाकण्यास त्याने सुरूवात केली. तो अत्यंत निःस्वार्थी होता. सन १७७६ मध्ये आॅगस्टस क्वीवलॅंड राजमहलचा मॅजिस्ट्रेट म्हणून आला. त्यानंतर तो भागलपूरचा मॅजिस्ट्रेट झाला.

गंगा व ब्राह्मी नद्यांच्या दुआबातील जंगल तराईच्या प्रदेशात तसेच मुंगेर, भागलपूर व संथाल परगाण्यात तिलकाच्या इंग्रजांशी अनेक लढाया झाल्या. तिलका मांझी त्यांना पुरून उरला. त्याच्या नेतृत्वाखालील वनवासी इंग्रजांना भारी पडत होते. इंग्रजांनी रामगढ कॅम्पवर ताबा मिळवला होता. तिलकाने पहाडिया सरदारांना बरोबर घेऊन १८७८मध्ये इंग्रजांचा पराभव करून रामगढ कॅम्प मुक्त केला.

जानेवारी १७८४ रोजी तिलका मांझीने भागलपूरवर चढाई केली. एका ताडाच्या झाडावर चढून त्याने, घोड्यावरून जात असलेल्या क्लीवलॅंडच्या छातीवर बाण मारला. क्लीवलॅंड तात्काळ घोड्यावरून खाली पडला आणि लगेच मरण पावला. त्याच्या निधनाने इंग्रज सैन्य हबकून गेले आणि मार्ग सापडेल तिकडे पळून गेले.

तिलका मांझीचा विजय झाला. त्याचे सैन्य विजयाचा आनंद साजरा करत असताना रात्रीच्या अंधारात सर आयर कूट व पहाडिया सरदार यांनी मिळून तिलका मांझीच्या बेसावध सैन्यावर अचानक हल्ला केला. त्या लढाईत तिलका मांझीचे बरेच सैनिक मारले गेले आणि पुष्कळसे गिरफ्तार करण्यात आले. तिलका मांझी आपल्या उरलेल्या सैनिकांसह सुलतानगंजच्या डोंगरात आश्रयाला निघून गेला आणि पुढची योजना ठरवू लागला. नंतर काही महिने त्याचे सैन्य इंग्रज सैन्याला आणि पहाडिया सैनिकांना गनिमीकाव्याने लढून बेजार करत होते.

तिलका मांझीचा पाडाव कसा करावा या विचाराने सर आयर कूट संत्रस्त झाला होता. त्याने तिलकाचे आश्रयस्थान असलेल्या डोंगरांना वेढे दिले. त्यांना बाहेरची रसद मिळू दिली नाही. अन्नपाण्यावाचून तिलकाच्या सैनिकांचे हाल होऊ लागले. तेव्हा गनिमीकाव्याने लढणे सोडून त्याने इंग्रजांशी आमने – सामने लढायचे ठरविले. आपल्या सैन्यासह तो डोंगर उतरून खाली आला व निकराने लढू लागला. त्या लढाईत धोक्याने तिलका इंग्रजांच्या हाती सापडला. त्याला जेरबंद करण्यात आले. सर आयर कूट त्यामुळे आनंदाने बेहोश झाला. त्याने तिलका मांझीला दोरखंडाने बांधून चार घोड्यांकरवी भागलपूरपर्यंत रस्त्यावरून फरपटत नेले. त्याचे अंग अंग सोलून निघाले तरी तो जिवंत राहिला. सर आयर कूटने त्याला भागलपूरच्या एका झाडावर फाशी दिली. नंतर त्याचे प्रेत त्या वडाच्या बुंध्याशी बांधून त्याच्या छातीत मोठे मोठे खिळे ठोकले. अशाप्रकारे या महान आदिवासी नेत्याने स्वातंत्र्याच्या बलिवेदीवर आपल्या प्राणांची आहुती दिली.

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भागलपूरमधील त्या चौकाला ‘ तिलका मांझी चौक ‘ असे नाव देण्यात आले आणि त्या चौकात एक चबुतरा उभारून त्यावर तिलका मांझीच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना करण्यात आली. त्याचे नाव स्वातंत्र्याच्या इतिहासात अमर झाले.

©  सुश्री शोभा जोशी

मो ९४२२३१९९६२ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “भारतीय अर्वाचीन गणिती : भास्कराचार्य आणि रामानुजन” ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

 

? इंद्रधनुष्य ?

☆ “भारतीय अर्वाचीन गणिती : भास्कराचार्य आणि रामानुजन☆ श्री जगदीश काबरे ☆

गणिताच्या क्षेत्रातील भारतीय गणितज्ञांचा इतिहास मागे वळून पाहिला तर थोर भारतीय गणिततज्ञांची मालिकाच डोळ्यांसमोर येते. आर्यभट्ट, ब्रह्मगुप्त, महावीर, माधवाचार्य, नीलकंठ सोमया, इ. या मालिकेत आपला ठसा जगावर उमटवणारे जेष्ठ व श्रेष्ठ गणितज्ञ ‘भास्कराचार्य द्वितीय’ यांच्या नावाचा उल्लेख केल्याशिवाय पुढे जाताच येणार नाही. 

भास्काराचार्यांचा जन्म इ.स. १११४ मध्ये उज्जैन जवळील ‘विज्जलविड’ येथे झाला. भास्कराचार्यांचे ज्योतिषशास्त्रातील (त्या काळात खगोलशास्त्र ही संज्ञा अस्तित्वात नव्हती. म्हणून आकाशातल्या ज्योतींचा अभ्यास करणारे ते ज्योतिषी, असे सगळ्या खगोलशास्त्रींना म्हटले जायचे.) त्यांच्या घराण्यात पूर्वीच्या सहा पिढ्या गणिताच्या अभ्यास करणाऱ्या होत्या. त्यापैकीच ‘ब्रम्हगुप्त’ हे एक होते. भास्कराचार्य हे अत्यंत कुशाग्र बुद्धीचे विद्यार्थी होते. त्याचे शिक्षण त्याच्या वडिलांजवळ झाले असे त्यांनी खालील बीजगणितांतल्या श्लोकात गुंफले आहे.

आसीत् महेश्वर इति प्रथितः पृथिव्याम् । 

आचार्यवर्यपदवीं विदुषां प्रपन्नः ।। 

लब्धावबोधकलिकां तत एव चक्रे । 

तज्जेन बीजगणितं लघु भास्करेण ।।

या श्लोकावरून त्यांचे वडील महेश्वर हे त्यांचे गुरु होत. त्यांच्यापाशीच भास्कराचार्यांनी बीजगणिताचे पाठ घेतल्याचे ते सांगतात. 

त्यांचा काव्य, व्याकरण, गणित, ज्योतिष वगैरे विषयांचा व्यासंग सर्वांग परिपूर्ण होता. पूर्वकाळी आचार्य पदवी मिळविण्यास किती ग्रंथांचे अध्ययन करावे लागत असे हे २६१ व्या श्लोकावरून समजून येते. गणेश दैवज्ञाने आपल्या टीकेत त्यांना ‘गणकचक्रचूडामणि’ ही पदवी अर्पण केली आहे. गणित व ज्योतिष हे विषय शिकविण्यांत ते निष्णात होते. त्याकाळची विद्वान मंडळी भास्कराचार्याच्या शिष्यांशीं वादविवाद करण्यास कचरत असत हे ताम्रपटांतील श्लोकांवरून दिसून येतें. भास्कराचार्याचा ‘सिद्धांत शिरोमणी’ हा गणितावरील प्रमुख ग्रंथ आहे. हा ग्रंथ त्यांनी वयाच्या ३६ व्या वर्षी लिहून पुरा केला. या ग्रंथाचे लिलावती, बीजगणित, ग्रहगणिताध्याय, गोलाध्याय असे चार खंड आहेत. 

ज्याप्रमाणें ‘लीलावती’ हा अंकगणितावरील उत्कृष्ट ग्रंथ आहे, त्याचप्रमाणें ‘बीजगणित’ हे अव्यक्त गणितावरचे उत्कृष्ट पुस्तक आहे. या पुस्तकावरही अनेक टीकाग्रंथ झाले. जगांतील प्रमुख भाषांतून लीलावती व बीजगणित यांची भाषांतरे झालेलीं आढळतात. बीजगणिताचे फारसी भाषांतर शहाजहानच्या कारकीर्दीत अताउल्ला रसीदी या ज्योतिषाने इ. स. १६३४ मध्ये केले. स्ट्राची या इंग्रज लेखकाने १८१३ साली इंग्रजी भाषांतर केले. ग्रहगणिताध्यायांत चंद्रसूर्यांच्या गति, भ्रमणें, ग्रहणें वगैरे गहन व क्लिष्ट विषय आलेले आहेत. याशिवाय भास्कराचार्याचे अनेक ग्रंथ आहेत. ते म्हणजे ‘करणकुतूहल’, ‘सर्वतोभद्रयंत्र’ ‘वसिष्ठतुल्य’ व ‘विवाहपटल’ हे होत. या सर्व ग्रंथाच्या मूळ हस्तलिखित प्रती आज आपल्याच अनास्थेमुळे कुठेच उपलब्ध नाहीत. प्राचीन वस्तूंचे जतन कसे करावे ही कला आम्हा महाराष्ट्रीयांना ठाऊक नाही. तथापि लीलावतीची सटीक हस्तलिखिते अजून उपलब्ध आहेत हेही नसे थोडके.

पायथागोरसच्या प्रमेयाची काटकोन त्रिकोणासंबंधीची एक सिद्धताही त्यांनी मांडली होती. ही सिद्धता कांही गणित तज्ञांच्या मते पायथागोरसच्या मूळ सिद्धतेशी वरीच मिळती जुळती आहे. गणितातील अनंत या संकल्पनेचा सर्वात पहिला सदर्भ त्यांच्या ‘सिद्धांत शिरोमणी’ या ग्रंथातील बीजगणित ह्या खंडात आलेला आहे. पुढे सिद्धांत शिरोमणी या ग्रंथाची फार्सी, इंग्रजी, मराठी, गुजराती, कन्नड, तामीळ भाषांत भाषांतरे झाली आहेत.

लीलावतीतील श्लोकांतून भास्कराचार्यांनी अनेक प्रकारचे कौशल्य दाखविले आहे. धर्म, वेद, पुराणे, महाकाव्ये यांची जाताजाता विद्यार्थ्यांना माहिती व्हावी हा एक महत्त्वाचा उद्देश असल्यामुळे त्यांनी गणिताच्या प्रश्नात या सर्व गोष्टींचा वापर केलेला आहे. ‘पार्थकर्णवधाय’ हा श्लोक रथासंबंधीं सर्व माहिती देण्यास उपयुक्त आहे. अर्जुनाचा कर्ण हा भाऊ असला तरी प्रामुख्यानें वैरी होता, ही गोष्ट विद्यार्थ्याच्या निदर्शनास आणली गेली आहे. पण याहीपेक्षा ह्या श्लोकांत प्रत्यक्ष लढाईचा देखावा वाचकांपुढे ठेवला आहे. कालिदासाच्या शाकुंतलांतील ‘ग्रीवाभंगाभिरामम्’ या श्लोकाशी वरील श्लोकाची तुलना होऊ शकेल. हंसांच्या समूहाचे वर्णन किंवा हत्तींच्या कळपाचे वर्णन, भुंग्यांच्या कळपाची संख्या, पाळलेल्या मोराचे सापावर तुटून पडणे, कमळ वाऱ्याच्या झोताने पाण्यात बुडणे इत्यादि सर्व गोष्टी विद्यार्थ्यांस निसर्ग सान्निध्यांत घेऊन जातात व विषय कंटाळवाणा होत नाही. 

भास्कराचार्यांनी कोठेच सूत्रसिद्धि दिलेली नाही, याचे कारण काय असेल? अर्थात् पूर्वीचे आचार्य सूत्रसिद्धि देत नव्हते. कारण ते सूत्रे काव्यामध्ये गुंफत होते. म्हणून त्यांना सूत्रसिद्धि आवश्यक वाटत नव्हती. भास्कराचार्यांनी पूर्वसूरींच्या पावलावर पाऊल ठेवून सूत्रसिद्धि दिली नाहीं, पण उदाहरणे मात्र भरपूर दिलेली आहेत. आर्यभट्ट ते भास्कराचार्य या ७०० वर्षाच्या काळात शास्त्रीय ग्रंथ कविता रूपात लिहिले जात व सिद्धांताचे स्पष्टीकरण किंवा सिद्धता देण्याच्या खटाटोपात कोणीच पडत नसे, याला भास्कराचार्यही अपवाद नव्हता. पण त्यामुळे भारतीय गणितशास्त्राचे केवढे नुकसान झाले आहे हे आता आपल्या लक्षात येत आहे. कारण सैद्धांतिक उपपत्ती लिहून तिचे दस्तऐवजीकरण करण्याची कमतरता पाश्चात्य शास्त्रज्ञांनी भरून काढल्यामुळे ते आज विज्ञानात अग्रेसर ठरले आहेत.

भास्कराचार्य हे दृकप्रत्ययवादी ज्योतिषी होते. ग्रहणे, युत्या, वगैरे अंतरिक्ष चमत्कार पंचांगांत दिलेल्या वेळेवर होत नसतील तर पंचांगे सुधारली पाहिजेत असे त्याचे मत होते. सनातनी लोक पुष्कळदा काही चुकीच्या कल्पना उराशी बाळगीत. त्यात राहू व केतु हे चंद्र व सूर्य यांना ग्रहणकाली गिळतात अशी एक खुळी कल्पना लोकांत दीर्घकाल रूढ होती. वास्तविक चंद्रग्रहणसमयी चंद्र पृथ्वीच्या छायेत गेल्यामुळे अदृश्य होतो. भास्कराचार्याला ही गोष्ट ठाऊक असूनही लोकांना ती पटविणे कठीण होते. ते लोकांना सांगत की, ‘ मंडळींनो, राहू-केतू नावाचे राक्षस नाहीत. पृथ्वीची छायाच चंद्राचा ग्रास करते. पण तुम्हांला राहू हवाच असेल तर असे म्हणा की, राहूने पृथ्वीच्या छायेत शिरून चंद्राचा ग्रास केला.’ अशा रीतीने जुन्या-नव्याचा समन्वय ते करीत असत. ते सुधारणावादी व्यवहारी शास्त्री होते. असे असले तरी तत्त्वाला मुरड घालण्यास ते तयार नसत. गणितासारख्या अमूर्त आणि गहन विषय मनोरंजनात्मक व काव्यामय पद्धतीने शिकविणारे ते आद्य पंडित होते. अशा या थोर गणितीने जे संशोधन केले त्याला इतिहासात तोड नाही. 

भास्कराचार्यानंतर महाराष्ट्रांत तरी विद्वान व प्रसिद्ध असे गणिती फारसे झालेच नाहीत. त्यांच्याच ग्रंथाची घोकंपट्टी करणारे बरेच होते, पण नवीन संशोधन करणारे असे विद्वान १७ व्या शतकाच्या अखेरीपर्यंत थोडेच झाले. त्यांत नाव घेण्यासारखे दोन-चारच असतील. त्यातील एकोणिसाव्या शतकातील एक महत्त्वाचे नाव म्हणजे रामानुजन.

रामानुजन यांचा जन्म २२ डिसेंबर १८८७ ला त्यावेळच्या मद्रास प्रांतातील तंजावर येथे झाला. रामानुजन यांचा पहिला संशोधनपर लेख इंडियन मॅथेमॅटिकल सोसायटीच्या नियतकालिकात १९११ साली छापून आला. त्यावेळी त्यांचे वय फक्त तेवीस वर्षांचे होते. या लेखामुळे जगाला त्यांच्या संशोधनाविषयी माहिती झाली आणि संशोधकांच्या वर्तुळात त्यांच्या नावाचा बोलबाला होऊ लागला. 

१९१३ साली रामानुजन यांनी केंब्रिज ट्रिनिटी कॉलेजच्या प्रो. हार्डी यांच्याशी पत्रव्यवहार सुरू केला. प्रो. हार्डी हे नामवंत गणितज्ञ असल्याने रामानुजननी त्यांच्याकडून मार्गदर्शनाची अपेक्षा व्यक्त केली होती. त्यांचे पत्र वाचताच रामानुजन हे गणिताचे गाढे अभ्यासक आणि पहिल्या दर्जाचे गणितज्ञ आहेत, असे मत प्रो. हार्डी यांनी व्यक्त केले होते. लवकरच रामानुजनना इंग्लंडला जाण्यासाठी शिष्यवृत्ती मिळाली आणि ते १७ मार्च १९१४ रोजी इंग्लंडला जाण्यासाठी निघाले. १९१४ ते १९१७ या अवघ्या तीन वर्षांच्या काळात रामानुजननी बत्तीस संशोधनपर लेख लिहिले. १९१८ साली रॉयल सोसायटीने त्यांना आपले सदस्यत्व बहाल केले. त्यावेळी ते फक्त तीस वर्षांचे होते. त्यानंतर त्यांना केंब्रिजच्या ट्रिनिटी कॉलेजची फेलोशिप मिळाली. ही फेलोशिप मिळवणारे ते पहिले भारतीय होत. त्यांच्या गणितातील भरीव कार्याचा गौरव म्हणून भारतात २२ डिसेंबर हा दिवस “गणित दिन” म्हणून पाळण्यात येतो.

©  जगदीश काबरे

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “आनंदाचा निर्देशांक !” – लेखक : श्री अभय भंडारी ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

? इंद्रधनुष्य ?

☆ “आनंदाचा निर्देशांक !” – लेखक : श्री अभय भंडारी ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर

आनंदाचा निर्देशांक ! अर्थात् “ Happiness Index.” 

       ….. हा नेमका काय प्रकार आहे ?

सकाळी कितीही लवकर उठून मुलाला/मुलीला कामासाठी बाहेर जायचं असेल, तर त्याचे प्रातर्विधी,स्नान होवून तो तयार होईपर्यंत आई त्याला गरम गरम स्वादिष्ट पोहे करून देते, त्याला तो नको म्हणत असताना बसून खायला लावते, शिवाय थोडे एका डब्यात भरून त्याच्या हातात ठेवते.तुला जेवायला उशीर झाला, तर हे पोहे खा,पोटाला थोडा आधार होईल.

 

असं म्हणणा-या आईच्या या प्रेमळपणाचं आयुष्यात कितीतरी वर्षांनी स्मरण होतं, डोळे आणि हृदय दोन्हीही तिच्या आठवणीने भरून येतात.या आठवणीने मनात आनंदाचे तरंग उठतात,या प्रत्यक्ष अनुभवाला येणा-या आनंदाचा निर्देशांक कसा मोजायचा ?

 

हिवाळ्यात कडक थंडीतल्या सकाळी वडिलांना त्यांच्या कंपनीच्या बस स्टॉपपर्यंत स्कूटरने रोज सोडायला जाणा-या प्रेमळ मुलाच्या कपाळावर ओठ टेकवून ,त्याच्या डोक्यावर कृतज्ञतेने, प्रेमाने हात फिरवून नंतर बसमध्ये बसल्यावरही खिडकीतून बराच वेळ हात हालवत भरलेल्या डोळ्यांनी त्याचा निरोप घेणा-या वडिलांनी आणि त्या मुलाने जो प्रेमाचा स्पर्श अनुभवला,तो पुढेही कित्येक वर्षे स्मृतींच्या रुपात पुनः पुन्हा साथ संगत करतो.हा निर्मळ आनंद कसा मोजता येईल ?

 

खिशात पैसे नसलेल्या एका जीवलग मित्राच्या हातावर त्याची मैत्रीण थोडे पैसे ठेवताना तिला त्याच्या डोळ्यात दिसणारी अगतिकता पहात त्याचा हात प्रेमाने हातात घेऊन नुसत्या डोळ्यांनी,त्या हळव्या स्पर्शाने एक शब्दही न बोलता ” हे ही दिवस निघून जातील रे ! चांगला काळ येईल अशी सांत्वना देते त्या क्षणी आणि नंतर कित्येक वर्षे तो क्षण कृतज्ञतेने आठवताना मनात ज्या आनंदाच्या लहरी उसळतात,त्या आनंदाचे मोजमाप कसे करायचे ?

 

इंटरव्ह्यूला जाणा-या भावाला धीर देणारी, त्याच्या कपड्यांना चांगली इस्त्री करून, ‘ तू आज हा ड्रेस घालून जा, आणि छान आत्मविश्वासाने विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं दे, तुझा जॉब पक्का ! ‘ असं म्हणणा-या, लहान असूनही पोक्तपणाने वागणा-या बहिणीच्या आठवणीने ती तिच्या सासरी अगदी सुखी आहे,रमली आहे हे माहित असूनही जेव्हा पुनः पुन्हा ते जुने क्षण, तिच्या डोळ्यातून ओसंडून वाहणारे प्रेम आपण अनुभवतो, तेव्हा या अश्रू भरल्या आनंदाची मात्रा कशी मोजायची ?

 

वृद्धापकाळी रात्री तीन चार वेळा उठाव्या लागणा-या आजोबांची चाहूल लागताच ताडकन् उठून बसत त्यांचा हात धरून त्यांना टॉयलेटपर्यंत नेणारा लाडका नातू नोकरीसाठी दूर जाताना त्यांचा निरोप घेतो, तेव्हा त्याच्या डोक्यावरून, चेहऱ्यावरून आपले थरथरते हात फिरवत नंतर त्याचे हात घट्ट धरून ठेवत, हा वियोग त्यांच्यासाठी किती अवघड आहे,याची न बोलता जाणीव करून देतात, हे मनात दाटून येणारे भावनांचे कढ कोणत्या परिमाणात मोजता येतील ?

 

आनंद आहेच ! तो क्षणाक्षणाला अनुभवाला येतो.

.. तो स्पर्शाने अनुभवता येतो… शब्दांनी अनुभवता येतो… नि:शब्द शांततेत शब्दाविना होणाऱ्या मूक संवादातून अनुभवता येतो… प्रेमळ माणसांच्या सहवासात अनुभवता येतो… या सहवासाच्या स्मृतींनीही जन्मभर अनुभवता येतो.

 

सत् चित् आनंद याचा अर्थ आनंदच सत्य आहे, आणि त्याचं वास्तव्य सतत तुमच्या चित्तातच असतं !

तुम्ही आनंदी असता किंवा नसता ! आनंदाचं मोजमाप करता येईल, असं उपकरण खरोखरच विज्ञानाला कधी शोधता येईल ?

… अमर्याद जिज्ञासा आणि शोधक बुध्दी ज्यांच्याकडे आहे, त्यांना खुशाल शोध घेऊ द्या … आनंदाच्या नेमक्या निर्देशांकाचा. …. आपण निरंतर आनंदात डुंबत राहू या.

 

आनंद आहेच ! दुःखाला कारण लागतं !! ती कशाला शोधायची ? 

आनंदाचे डोही आनंद तरंग !!!! 

 

लेखक : श्री अभय भंडारी

 पुणे

संग्राहक : श्री मोहन निमोणकर

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘तीन म्हणजे एक नव्हे …’ लेखक : प्रा. हरी नरके  ☆ सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘तीन म्हणजे एक नव्हे …’ लेखक : प्रा. हरी नरके  ☆ प्रस्तुती– सौ. उज्ज्वला केळकर

स्व विंदा करंदीकर

Vinda Karandikar memorial in Chetana college | चेतना महाविद्यालयात विंदांचे राष्ट्रीय स्मारक | Loksatta

श्रेष्ठ कविवर्य स्व गोविंद विनायक करंदीकर ख्यातनाम ‘विंदा करंदीकर’

(जन्म – २३ ऑगस्ट १९१८ – मृत्यू – १४ मार्च २०१०)

मुंबईतील एक नामवंत संस्था. साहित्यिकांना मोठमोठे पुरस्कार देऊन त्या अकादमीतर्फे सन्मानित केले जाई. एक श्रीमंत सिंधी गृहस्थ त्या अकादमीचे प्रमुख होते. ते विविध वाङ्मयीन उपक्रमही चालवीत असत. त्याकाळात अकादमीचा मोठाच बोलबाला होता.

श्रेष्ठ कवी विंदा करंदीकर यांना घरातले आणि जवळचे लोक भाऊ म्हणत. भाऊ कडवे कोकणी होते. प्रतिभावंत, प्रखर तत्वनिष्ठ आणि स्पष्टवक्ता.

एकदा भाऊंचा फोन आला. म्हणाले, ” हरी, एक कार्यक्रम आलाय. त्यांना आपण तिघे हवे आहोत. दयाशी (पवार) मी बोललोय तो येतो म्हणालाय. तूही वेळ काढ. प्रत्येकी एक हजार रूपये आणि एकेक नारळ असं मानधन देणार आहेत. जाण्यायेण्याचं भाडं आणि चहा देणार आहेत. ठीकाय ना? “

मी ताबडतोब होकार दिला. भाऊ आणि दयाकाका या दिग्गजांच्यासोबत कार्यक्रम म्हणजे धमाल.

कार्यक्रम एका मोठ्या हॉटेलमध्ये होता. कार्यक्रम झकास झाला. खूप रंगला. भाऊ दिलेला नारळसुद्धा वाजवून बघायचे. पाणी कमी असेल तर दुसरा आणा असं स्पष्ट सांगायचे. कोकणी बाणा.

भाऊंनी संयोजकांना स्टेजवर बोलावले, म्हणाले, ” चला, व्यवहाराचे उरकून टाका. “

संयोजक आत गेले आणि त्यांनी तीन बंद पाकीटे आणून आम्हा तिघांना दिली. भाऊंनी पाकीट उघडून तिथेच पैसे मोजले. पाकीटात ७०० रूपये होते. भाऊंनी संयोजकांना बोलावले, ” मालक, अहो, यात तीनशे रूपये कमी आहेत. आपले प्रत्येकी एक हजार ठरले होते. “

आम्हा दोघांना भाऊ म्हणाले, “अरे, तुमचीही पाकीटे उघडून बघा. व्यवहार म्हणजे व्यवहार, त्यात संकोच कसला?”

पण दयाकाका म्हणाले, “भाऊंचं ठिकय. मोठा माणूसय. आपण असं स्टेजवर कसं पाकीट उघडून बघायचं ना?”

संयोजकांनी भाऊंना तीनशे रूपये आणून दिले. म्हणाले, ” माफ करा, कार्यालयातील मंडळींनी पाकीटं भरताना चुकून कमी रक्कम भरली. “

आम्ही निघालो. टॅक्सीत बसल्यावर आम्ही दोघांनी आमची मानधनाची पाकिटं उघडून बघितली.

दयाकाकांच्या पाकीटात २०० रूपये होते आणि माझ्या पाकिटात शंभर. म्हणजे तिघांना प्रत्येकी एक हजार देण्याऐवजी तिघांना मिळून एक हजार दिलेले. भाऊ तडकले. भाऊंनी टॅक्सी थांबवली. संयोजकांना बोलावलं आणि त्यांना झापलं. ठरल्याप्रमाणं मानधन दिलेलं नाही. दिलेला शब्द तुम्ही पाळलेला नाही. तत्व म्हणजे तत्व, काय समजले? तिघांना प्रत्येकी एक हजार ठरले होते. तुम्ही तिघांना मिळून एक हजार दिलेत. तीन म्हणजे एक नव्हे. आत्ताच्या आत्ता पूर्तता करा… आणि हो, दरम्यान तुमच्या चुकीमुळे टॅक्सीचा खोळंबा झाल्याने तिच्या भाड्यापोटी पंचवीस रूपये अधिकचे द्या टॅक्सीवाल्याला. काय समजले? “

भाऊंचा सात्विक संताप उफाळून आला होता. संयोजकांनी उरलेले पैसे आणून दिले, परत ते कार्यालयातील लोकांनी पाकीटं भरताना घोळ केला वगैरे सांगायला लागले. भाऊ म्हणाले, ” तसं असेल तर कार्यालयातील लोकं बदला किंवा किमान तीन वेगवेगळ्या नविन सबबी शोधून ठेवा. “

एके दिवशी भाऊंचा फोन आला. त्यांना मंत्रालयात यायचे होते. किल्लारीच्या भूकंपग्रस्तांच्या निधीला मुख्यमंत्री फंडाला त्यांना छोटीशी देणगी द्यायची होती. त्यांच्या दोन अटी होत्या. ही देणगी गुप्त राहायला हवी. तिचा गवगवा व्हायला नको. बातमीदारांना कळता कामा नये.

त्यांना सी. एम. ना किंवा अन्य कुणालाही भेटायचे नव्हते, फक्त देणगीचा चेक देऊन ते परत जाणार होते.

मी भाऊंच्या मंत्रालय प्रवेशिकेची व्यवस्था केली. भाऊ बांद्र्यावरून बसने आले. आम्ही मुख्यमंत्री सहायता निधी कार्यालयात गेलो. भाऊंनी चेक दिला. पावती घेतली. भाऊंचे नाव ऎकून तो अधिकारी चमकला. त्याने भाऊंना खुर्ची दिली. चहा मागवतो म्हणाला. भाऊ म्हणाले, ” धन्यवाद. पण मला जरा घाई आहे. तुम्ही मुद्दाम बोलावलंत तर चहाला मी परत कधी तरी नक्की येईन. आत्ता नको. एकतर ही माझी चहाची वेळ नाही आणि मी हरीकडून असं ऎकलंय की मंत्रालयातला चहा अत्यंत मचूळ असतो. मला आज माझ्या जिभेची चव बिघडवून घ्यायची नाही. पण विचारल्याबद्दल धन्यवाद. आज मी माझ्या कामासाठी आलोय. चहाला नाही. जत्रेत पाहुणा ओढून काढू नका.”

अधिकार्‍याने भाऊंना दिलेली पावती पंख्याच्या वार्‍याने उडाली. मी ती उचलून भाऊंना दिली, तेव्हा माझी नजर रकमेच्या आकड्यावर पडली. भाऊंनी पाच लाख रूपयांची देणगी दिलेली होती. ही म्हणे छोटीशी देणगी. जे भाऊ नारळसुद्धा वाजवून घ्यायचे ते पाच लाखाची देणगी भूकंपग्रस्तांना मदत म्हणून कोणताही गाजावाजा न करता देऊन गेले.

आम्ही मंत्रालयाबाहेर आलो. भाऊ बसला उभे राहिले. बसला वेळ होता. मी म्हटलं, ” भाऊ, इथल्या टपरीवरील चहा फक्कड असतो. घेऊया का एकेक कटींग?”

भाऊ म्हणाले, “असं म्हणतोस? ही माझ्या चहाची वेळ नाही. पण चल घेऊया. मात्र एका अटीवर, मी तुझ्यापेक्षा वयानं मोठा असल्यानं पैसे मात्र मी देणार हो. “

भाऊंकडे किश्यांचा अफलातून खजिना असायचा. ते आपल्या तिरकस शैलीत तो सांगताना अगदी हरवून जायचे. अनेकांची फिरकी घेण्यात ते पटाईत होते. त्यातून ते स्वत:लाही वगळायचे नाहीत. मजा म्हणजे ते आपले किस्से सांगताना आपण कसे गंडलो, आपली कशी फजिती झाली किंवा आपल्याला शेरास सव्वाशेर कसे भेटले हेही सांगायचे. ते त्यात आरपार हरवून जायचे. त्यांनी सांगितलेला हा त्यांच्याच फजितीचा एक प्रसंग…..

विंदा, मंगेश पाडगावकर आणि वसंत बापट तिघा कवींच्या काव्यवाचनाचा कार्यक्रम त्या काळात फार गाजत होता. कार्यक्रमाची व्यवस्था बघण्याची जबाबदारी फिरती असायची. एकदा अकलुजच्या साखर कारखान्याचे निमंत्रण आले. चेअरमन शंकरराव मोहिते पाटील तमाशाचे शौकीन. कुणीतरी म्हणाले, ‘काव्यवाचन ठेवू या’. ते लगेच तयार झाले.

स्वत: एम. डी. आले होते निमंत्रण घेऊन मुंबईला. त्यांना दारातच थांबवून व्यवस्थापक कविवर्य वसंत बापटांनी त्यांच्या हातात २७ अटींचा कागद सोपवला.

पुढच्या वेळी येताना फोन करून, वेळ घेऊनच यायला बजावले.

लेखी नियमांप्रमाणे अ‍ॅडव्हान्सची रक्कम द्यायला फोन करून, वेळ घेऊन एम. डी. भेटायला आले.

परत कविवर्य बापटांनी त्यांना दारातूनच कटवले. तसे बापट अतिशय सोशल होते. पण दोन वेळा एम. डी. शी ते कळत नकळत असं वागून गेले. कदाचित त्यांच्या मनात काही नसेलही. पण एमडी रागावले. बापट स्वभावाने ओलावा असलेले. पण….

एम. डीं. नी हा अनुभव चेअरमनना सांगितला. चेअरमन मोहिते पाटील म्हणजे नामांकित पण बेरकी राजकारणी होते. त्यांनी २७ नियमांचा कसून अभ्यास केला. नियमाप्रमाणे कवींना रेल्वेची फर्स्ट क्लासची तिकीटं पाठविण्यात आली. कवींना कुर्डुवाडी स्टेशनवर घ्यायला मर्सिडीज गाडी पाठविण्यात आली.

राहण्या-जेवणाची व्यवस्था ठरल्याप्रमाणे उत्तम करण्यात आली होती. प्रत्येक अटीचे काटेकोर पालन केलेले.

कार्यक्रमाला तिन्ही कविवर्य सभागृहात पोचले तर तिकडे सभागृह संपूर्ण मोकळे. स्टेजवर फक्त एम. डी. आणि चेयरमन दोघेच.

कवीवर्यांनी श्रोत्यांची चौकशी केली. तेव्हा चेअरमन म्हणाले, ” तुमच्या २७ अटींमध्ये कार्यक्रमाला श्रोते हवेत अशी अटच नाही. आता तुम्हाला या रिकाम्या सभागृहापुढेच कविता वाचाव्या लागतील. “

…… स्वत:ची चूक बापटांच्या लक्षात आली. पण ती कबूल करायला तेव्हा ते तयार नव्हते. भाऊ पुढे झाले. ते चेअरमनना म्हणाले, ” मुदलात आमच्या माणसाकडून काहीतरी आगळीक झाली असणार. आम्ही कवी जरा विक्षिप्त असतो. मी स्वत: तुमची क्षमा मागतो. “

चेअरमन म्हणाले, “अहो, आमचा माणूस ४०० किलोमीटरवरून तुम्हाला फोन करून तुमची वेळ घेऊन अ‍ॅडव्हान्सची रक्कम द्यायला येतो. तुम्ही त्याला साधं घरातही घेत नाही. पाणीही विचारीत नाही. एव्हढा माणूसघाणेपणा ?”

….. व्यवस्थापकांच्या वतीने भाऊंनी चूक झाल्याचे मान्य केले. सपशेल माफी मागितली.

चेअरमननी एमडींना शेजारच्या सभागृहात पिटाळले. तिकडे लावण्यांचा फड रंगलेला होता. एमडींनी स्टेजवर जाऊन घोषणा केली, ” मंडळी, शेजारच्या सभागृहात एक सांस्कृतिक प्रोग्रॅम होणार आहे. आपण सर्वांनी तिकडे जायचेय. चेअरमनसाहेबांचा तसा निरोप आहे. तो कार्यक्रम झाला की हा कार्यक्रम पुन्हा पुढे सुरू होईल. तर आता जरा सांस्कृतिक चेंज. “

५ मिनिटात सभागृह खचाखच भरले. तीन कवींचा काव्यवाचनाचा कार्यक्रम इतका रंगला की लोक लावण्यांचा कार्यक्रम विसरले.

त्यानंतर कार्यक्रमाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी मात्र बापट यांच्याकडून भाऊंनी स्वत:कडे घेतली. भाऊ म्हणायचे, “ हरी, राजकारणी लोक महाहुषार असतात. शहाण्याने त्यांच्याशी पंगा घेऊ नये. कसा धडा शिकवतील सांगता येणार नाही !” 

लेखक : प्रा. हरी नरके

प्रस्तती : सौ. उज्ज्वला केळकर 

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो.  836 925 2454, email-id – [email protected] 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ डेनिस डिडेरोट इफेक्ट — ☆ माहिती संग्राहक – श्री सुहास सोहोनी ☆

श्री सुहास सोहोनी

? इंद्रधनुष्य ?

☆ डेनिस डिडेरोट इफेक्ट — ☆ माहिती संग्राहक – श्री सुहास सोहोनी ☆

— डेनिस डिडेरोट  —

रशियात डेनिस डिडेरोट नावाचा एक अभ्यासू वाचक होता. इ. स. 1765 मध्ये त्याचे वय जवळ पास 52 वर्ष होते. त्याने खूप ग्रंथ वाचले होते. त्याचे स्वत:चे मोठे ग्रंथालय होते. त्याचे संपूर्ण आयुष्य वाचनात; पण गरिबीत गेले. मुलीच्या लग्नासाठी सुद्धा त्याच्याकडे पैसे नव्हते. इतका तो गरीब होता. त्या वेळी रशियाची राणी कँथरीनला डेनिस डिडरोटच्या गरीबीबद्दल कळले. तिने डिडेरोटला त्याच्याकडील लायब्ररी विकत घेण्यासाठी 1000 GBP, म्हणजेच 50 हजार डॉलर्स म्हणजे; आजचे जवळपास साडेतीन कोटी रुपये डिडरोटला देऊ केले. डेनिस डिडरोटने मान्य केले व त्याने आपले ग्रंथालय विकून टाकले.

डेनिस डिडेरोट एका दिवसांत खूप श्रीमंत झाला. त्याने त्या पैशातून लगेच ‘स्कार्लेट रॉब’; म्हणजे एक उच्च प्रतीचा व महाग असा पोषाख खरेदी केला. हा सदरा वापरत असतांना त्याला वाटले की; आपण उच्च प्रतीचा पोषाख घालतोय; पण आपल्या घरात मात्र तशा उच्चप्रतीच्या वस्तू नाहीत. मग त्याने हळूहळू घरातल्या वस्तू बदलल्या. किचन रूममधल्या वस्तू बदलल्या. फर्निचर बदलले. सगळं काही नवं नवं. आता त्याचं संपूर्ण घर आणि पोषाख दोन्ही ही शोभून दिसत होते. परंतु हे सगळं केल्याने तो पुन्हा कंगाल झाला आणि कर्ज ही वाढत गेले. मोठ्या दु:खाने डेनिस डिडरोटने हे सहन केले आणि मग त्याने हे सगळे अनुभव आपल्या एका निबंधांत लिहून ठेवले. यालाच मानस शास्त्रातील ‘डिडरोट इफेक्ट’ (Diderot Effect) म्हणतात.

भारतातले मोठे उद्योजक, व्यापारी, ट्रेडर्स, डेव्हलपर्स पुढारी सुद्धा; या ‘इफेक्ट’चा छुप्या पद्धतीने अवलंब करतात. याचे निरीक्षण आपण स्वत: बद्धल करून पहाण्यास हरकत नाही. कसे?

समजा आपण महागडे कपडे घेतले; तर त्याला मॅचिंग घड्याळ, पेन, बूट, गाडी…. इ. घेणार.

घरात मोठा टी. व्ही. आणला की चांगला टेबल, फर्निचर, HD वाहिन्या सुरु करणार. घराला नवा रंग लावला की त्याला मॅचिंग पडदे लावून सजावट करणार.

समजा आपण पन्नास हजार रूपयांचा मोबाईल घेतला; तरी आपल्याला आणखी काहीतरी कमी आहे असे वाटते. मग अजून 600 रुपयांचा गोरील्ला ग्लास लावणार. दर महिन्याला 500 रुपयांचे कव्हर बदलणार. शंभर रुपयांचा हेडफोन चालला असता; पण अडीच तीन हजाराचा हेडफोन घेणार. कारण या मोबाईलला स्वस्त शोभून दिसत नाही. हे सर्व कशासाठी? इतरांवर इंप्रेशन मारण्यासाठी. यालाच म्हणतात ‘डिडेरोट इफेक्ट’ 

थोडक्यात सांगायचे तर; एक नवीन वस्तू विकत घेतली की; तिच्यामुळे दुसऱ्या वस्तूंचा दर्जा आपोआपच कमी होतो; आणि तो वाढविण्यासाठी आपण आणखी जास्त खर्च करीत जातो.

सर्वच उद्योजक, व्यापारी, ट्रेडर्स या ‘इफेक्ट’चा छुप्या पद्धतीने वापर करतात.

एक laptop विकत घेतांना त्यासोबत हजार दोन हजाराचा antivirus टाकून देतो. हजार बाराशेचं कव्हर घेतो; ज्याचा क्वचितच वापर केला जातो. कुंडी वा फुलझाड विकत घेतलं की; सोबत शे दोनशे रुपयाचे खत माथी मारलं जातं. लग्न समारंभात तर या प्रदर्शनाची चढा ओढ लागलेली दिसून येते. अशी असंख्य उदाहरणे आहेत.

आपण एक वस्तू घ्यायला गेलो की; दुसऱ्या वस्तू आपोआपच घेतो; गरज नसली तरी. अशा पद्धतीने आपण एक एक वस्तू घेऊन अनेक अनावश्यक किंवा फारशा महत्वाच्या नसणाऱ्या वस्तू घेत असतो; आणि ते आपणास कळत सुद्धा नाही. यालाच ‘spiraling consumption’ म्हणतात. म्हणजे; एका वस्तूमुळे दुसऱ्या वस्तूची गरज वाटणे आणि ती विकत घेणे. हाच तो ‘डिडेरोट इफेक्ट’ (Diderot Effect) होय. ही सामान्य मानवी प्रवृत्ती (human tendency) आहे.

या प्रवृत्तीचे परिणाम भयानक होत असतात; पण ते उघड्या डोळ्यांनी दिसत नाहीत. आपण नकळतपणे अनावश्यक खर्च करत जातो. काही लोकांच्या हे लक्षात येतं; तर काहींच्या लक्षात खूप उशिरा लक्षात येतं पण अनेकांच्या हे लक्षातच येत नाही. म्हणून ते खूप खर्च करीत असतात.

माणसाला खर्च करताना भीती वाटत नाही; पण नंतर हिशोब लागत नाही; तेव्हा त्याचा त्रास होतो. म्हणून कोणतीही वस्तू खरेदी करताना; या वस्तूची मला कितपत गरज आहे? असा स्वत:च स्वत:ला प्रश्न विचारावा. विचार करून त्याचं उत्तर जर होय आलं तरच ती वस्तू खरेदी करण्याचा निर्णय घ्यावा. असा निर्णय घेतल्यावर त्या वस्तूचा दर्जा आणि किंमत वाजवी आहे कां? याचा विचार करून मिळेल त्या किंमतीत न घेता ती वाजवी किंमतीत घेण्याचा प्रयत्न करावा.

दुकानदार एक वस्तू समोर ठेवतो; लगेच तो दुसरी वस्तू दाखवून संभ्रम निर्माण करतो. तेव्हा एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की; ती वस्तू कितीही चांगली असली; तरी तिचा आपल्या उपयोगितेशी व आनंदाशी काही संबंध नसतो. तो आनंद क्षणिक असतो. कालांतराने तो आनंद ही संपतो आणि पैसे ही जातात. म्हणून या प्रवृत्तीला आळा घालण्याची गरज आहे. पण त्यासाठी स्वतःच प्रयत्न करावा लागतो.

संदर्भ : ‘ डिडेरोट इफेक्ट ‘ 

(Diderot Effect – – Understanding the ‘Diderot Effect’ and how to overcome it ? )

संकलन व प्रस्तुती : श्री सुहास सोहोनी 

रत्नागिरी

मो ९४०३०९८११०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मोक्षदा एकादशी असूनही.. ? — लेखक – ॲड. रमेश दिनानाथ जोशी ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆

? इंद्रधनुष्य ?

मोक्षदा एकादशी असूनही.. ? — लेखक – ॲड. रमेश दिनानाथ जोशी ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर

आज मार्गशीर्ष महिन्यातील शुद्ध एकादशी म्हणजे मोक्षदा एकादशी आहे. तरीही पंढरीमध्ये भक्तांची गर्दी का नाही? तर त्याचे कारण आहे की मार्गशीर्ष महिन्यात पांडुरंग हा गोपाळपूर जवळील विष्णू पदावरती विराजमान आहे.

त्याची माहिती घेण्याचा प्रयत्न करूया…..

२६ नोव्हेंबरला कार्तिक वद्य एकादशी म्हणजे आळंदी एकादशी झाली.

या एकादशीला आळंदी एकादशी म्हणण्याचे कारण म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींनी समाधी मध्ये लिन होण्याचे निश्चित केले होते. त्यामुळे सर्व भागवत भक्त वारकरी मंडळी यांनी एकच आळंदीकडे धाव घेतली होती. लाडक्या भक्ताचा निश्चय समजल्याने प्रत्यक्ष पांडुरंगाने देखील आळंदी कडे धाव घेतली होती. त्यामुळे कार्तिक वद्य एकादशीला म्हणजे आळंदी एकादशीला लाखो वारकरी भक्त आळंदी मध्ये दर्शनासाठी उपस्थित आजही असतात. त्यानंतर एक दिवसाचे अंतराने कार्तिक वद्य त्रयोदशीला ज्ञानेश्वर माऊली यांचा संजीवन समाधी सोहळा होत असतो. लाखो भागवत भक्तांच्या वारकऱ्यांच्या डोळ्यात अश्रूंचां महापुर असतो. माऊली शिवाय दुसरा शब्द कानावर पडत नाही. आज जर आपल्या मनाची इतकी उलघाल होत असेल तर प्रत्यक्ष माऊलींनी समाधी घेताना त्या वेळची परिस्थिती कशी असेल ? काय असेल लहान बंधू सोपान याच्या मनाची अवस्था ? काय असेल त्या मुक्ताईची मनाची अवस्था ? 

निवृत्तीनाथ मात्र स्थितप्रज्ञ आणि गुरूच्या भूमिकेत असल्याने धीर गंभीर शांत होते समाधी घेण्यासाठी माऊलींनी गुहेत प्रवेश केल्यावर निवृत्तीनाथ दादांनी हाताला धरून माऊलींना आसनावर बसविले, कोण होते त्यावेळी साक्षीला तर प्रत्यक्ष पांडुरंग च, अन्य कोणी नव्हते. बाहेर येऊन गुहेचा दरवाजा मोठ्या दगडी शिळेने बंद करताना मात्र मुक्ताईने मात्र हंबरडा फोडून एकच आर्त किंकाळी मारली होती. त्या वेळचाच अभंग म्हणजे ताटी उघडा ज्ञानेश्वरा हा होय. लाडक्या भक्ताने म्हणजे माऊलींनी समाधी घेतल्याने प्रत्यक्ष पांडुरंगाला देखील विरह सहन झाला नाही आणि त्यांनी पंढरी सोडली आणि भीमा नदीच्या तीरावर गोपाळपूर येथे विष्णू पदावर जाऊन मन शांत करण्याचा प्रयत्न म्हणून एक महिना वास्तव्य केले. म्हणून मार्गशीर्ष महिन्यात पांडुरंग पंढरपूर मध्ये नसून विष्णू पदावर वास्तव्यास असतो, म्हणून तिथे सर्व भक्त मंडळी दर्शनासाठी रांग लावतात.

गोपाळपूरलाच बाल गोपाळांचा मेळा जमवून गुरे राखताना तिथेच भक्तासह घरच्या जेवणाचा अंगत पंगत करून गोपाळकाला करून देवाने प्रसाद ग्रहण केला होता, त्याची आठवण म्हणून आजही विष्णू पदावर घरचे डबे घेऊन जाऊन सामुदायिक एकत्र बसून प्रसाद घेण्याची परंपरा भक्ताकडून पाळली जाते. विष्णुपदावर नदी काठाला घाटावर पायऱ्या उतरताना संत सखुला जिथे सुळावर देण्याचा प्रयत्न झाला आणि त्या सुळा चे पाणी झाले अशी आख्यायिका आहे, ती जागा तिथे आहे. तर जवळच गोपाळपूरला संत जनाबाईचा संसार आहे. जनाबाईंनी पांडुरंगाबरोबर दळण दळलेले दगडी जाते आणि हांड्यामध्ये विरजण घुसळलेले रवी वगैरे दाखवली जाते. विष्णू पदावर नदीपात्रामध्ये छोटेसे नारद मंदिर देखील आहे.

आळंदी म्हणजे इंद्रायणी काठी वसलेली अलंकापुरी होय.

ज्ञानेश्वर माऊली यांचा काळ १२ व्या शतकातला. तर संत एकनाथ महाराज यांचा काळ सतराव्या शतकातला. देवत्वाला पोहोचलेली आणि देवाशी संधान समक्ष बांधलेली अशी ही संत मंडळी. १२ व्या शतकात माऊलींनी समाधी घेतल्यानंतर गुहेच्या वरती असणाऱ्या अजान वृक्षाची मुळे गुहेमध्ये जाऊन माऊलींच्या शरीराला आणि गळ्याला गुंडाळल्यासारखी झाली होती, त्यामुळे माऊलींना त्रास होत होता, पण सांगणार कोणाला ? आणि समजणार कोणाला ? प्रत्येक प्राणीमात्रामध्ये आणि वनस्पतीमध्ये सुद्धा जीव असतो असे आपला धर्म सांगतो. साहजिकच अजानवृक्षाच्या मुळांना देखील माऊलींच्या आकर्षणाने मोह आवरला नसणार आहे. माऊलींनी संत एकनाथ महाराजांच्या कानावर ही गोष्ट आंतरज्ञानाने घातली असावी. त्यामुळे संत एकनाथ महाराज यांनी माऊलीच्या समाधीच्या गुहेवरील शिळा बाजूला करून त्या अजानवृक्षांच्या सर्व मुळांना बाजूला केले होते अशी देखील आख्यायिका आहे. असे ऐकले आहे. जाणकारांनी यावर प्रकाश टाकावा. देवावरती ज्यांची आढळ श्रद्धा आहे त्यांना निश्चित प्रचिती येत असते.

ज्यांची श्रद्धा आहे त्यांनी माऊलीचे दर्शन घ्यावे. ज्यांची श्रद्धा नाही त्यांना आमचा अजिबात आग्रह नाही. त्यांनी तिकडे फिरकू देखील नये.

माऊलींना त्यांच्या २१ वर्षाच्या आयुष्यामध्ये खूप लोकांनी त्रास दिला, यातना सोसाव्या लागल्या. तरी देखील त्यांनी कोणालाही दोष दिला नाही. ज्ञानेश्वरी हा जगाच्या अंतापर्यंत मानव धर्माला मार्गदर्शन करेल असा ग्रंथ लिहून ठेवला आहे. ज्ञानेश्वरी ग्रंथ ज्या खांबाला टेकून माउलींनी लिहिला आहे त्या दगडी खांबाचे देखील नेवासा येथे मंदिर बांधले आहे.

जप तप साधना करणे हे जसे परमेश्वर प्राप्तीचे साधन आहे, तसेच सर्वसामान्य भक्तांच्यासाठी वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानोबा तुकाराम किंवा बोलीभाषेत ग्यानबा तुकाराम हा मंत्र म्हणजे देवापर्यंत जाण्यासाठीचा जवळचा मार्ग म्हणजे शॉर्टकट आहे असे समजण्यास हरकत नाही. देव हा भावाचा भुकेला आहे. नियत साफ ठेवा, भावना पवित्र ठेवा, म्हणजे प्रत्यक्ष पांडुरंग तुमच्याजवळ हजर आहे.

आळंदीला बऱ्याच वेळा जाऊन माऊलीचे समाधीचे दर्शन घेतले आहे, तसेच नेवासा येथील त्या पवित्र खांबाचे देखील दर्शन घेतले आहे. आषाढी आणि कार्तिकी वारीसाठी पालख्या येत असतात. कोणालाही आमंत्रण नसते, सांगावे लागत नाही, तरी देखील आषाढी वारीसाठी माऊलीच्या पालखी बरोबर दरवर्षी लाखोच्या संख्येने वारकरी वाढतच आहेत.

जो जे वांच्छील तो ते लाहो प्राणीजात !

असे फक्त पसायदानामध्ये ज्ञानेश्वर माऊलीच देवाकडे सर्व प्राणीमात्रासाठी प्रार्थना करून मागणी मागू शकतात. असा हा आपला भागवत धर्म जगामध्ये श्रेष्ठ आहे.

ज्ञानेश्वरी मधील प्रत्येक ओवीला शास्त्र आधार आहे.

‘ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर’

अशी संत मंडळी उगीच गोडवे गात नाहीत.

ज्ञानेश्वरी हा पवित्र ग्रंथ घरी आणून पारायण जरी जमले नाही तरी निदान रोज एक तरी ओवी वाचून पुण्यसंचय करावा, आयुष्याचे सार्थक होईल.

जय हरी माऊली !

लेखक : ॲड. रमेश दिनानाथ जोशी

मंगळवेढा, मो. नं. ८२७५५०६०५०

प्रस्तुती – श्री अनंत केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “मधुलिका… सावली एका वीर योद्ध्याची !” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

 

? इंद्रधनुष्य ?

मधुलिका… सावली एका वीर योद्ध्याची !  ☆ श्री संभाजी बबन गायके 

मधुलिका… सावली एका वीर योद्ध्याची ! 

 ”आपल्या प्रिन्सेस मधुलिकासाठी आता एखादा राजकुमार पहायला हवा !”.. मी जेव्हा जेव्हा कॉलेजातून एखादं प्रमाणपत्र, एखादं पारितोषिक घेऊन घरी यायचे तेव्हा तेव्हा पिताश्री आमच्या मातोश्रींना हे वाक्य म्हणायचेच ! आज मी मानसशास्त्रातील डीग्री घेऊन घरी आले तेव्हाही अगदी तोच संवाद झडला आई-बाबांच्यात. पण यावेळी बाबांच्या आवाजात काहीसा निश्चयच दिसला.

मी म्हटलं, ”आता कुठे राहिलेत राजेरजवाडे, मला राजकुमार मिळायला? तुम्ही तर आता राजकारणात आहात… एख्याद्या मोठ्या नेत्याच्या मुलाशी द्याल माझी लग्नगाठ बांधून !” 

बाबा म्हणाले, ”आता स्वतंत्र हिंदुस्थानात कुणी राजा नसला तरी शूर सरदारांची काही कमतरता नाही. माझ्या पाहण्यात एक लढवय्या, हुशार, राजबिंडा तरुण आहे.. तुझ्यासाठी सुयोग्य असा. मी पूर्वतयारी करून ठेवलीय, फक्त तुझ्या मनाचा अंदाज घ्यावा म्हणून थांबलो होतो ! ” 

.. हे ऐकताना माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले होते. पण बाबा पुढे म्हणाले ते ऐकून एकदम धक्काच बसला. “ मधुलिका, पण एक अडचण आहे… त्याचं एक लग्न झालंय आधीच !” 

माझ्या चेहऱ्यावरचं भलं मोठ्ठं प्रश्नचिन्ह पाहून बाबा हसून म्हणाले, ”अगं आर्मी ऑफिसर आहे तो… तलवारीशी लगीन झालंय त्याचं आधीच ” 

माझ्या चेह-यावरचं प्रश्नचिन्ह आता अधिकच बाकदार झालं होतं. “ बाबा ! नीट सांगा ना अहो “.

त्यावर बाबा म्हणाले, ” बिपिन रावत त्याचं नाव. एका मोठ्या आर्मी ऑफिसरचा सुपुत्र. एन. डी. ए. पासआऊट आहे. आणि इंडियन मिलिटरी अ‍ॅकॅडमी, डेहरादून मधल्या ट्रेनिंगमध्ये पहिला नंबर पटकावून बहादराने मानाची तलवार मिळवलीय…’ स्वोर्ड ऑफ ऑनर ! ‘ हमने तुम्हारे लिए बात चलायी है…. ! “ 

… “ यानंतर बाबा माझ्याशी, आईशी काय काय बोलत राहिले कोण जाणे ! माझे कशातही लक्ष नव्हते…. मी तर अगदी हरखूनच गेले होते… मला असंच आव्हानात्मक, साहसी आयुष्य हवं होतं ! आणि सैनिकाशिवाय ते मला दुसरं कोण देऊ शकणार होतं? आणि त्यात बिपिन तर आर्मी ऑफिसर ! लहानपणापासूनच मला त्या रूबाबदार युनिफॉर्मचं भारी आकर्षण होतं. कर्मधर्मसंयोगानं मनासारखं आयुष्य लाभणार होतं…. माझा होकार माझ्या लाजण्यातूनच व्यक्त झाला.

मग लग्नाआधी मीही थोडा अभ्यास केला आर्मी लाईफचा. हो, आर्मीवाल्यांच्या सगळ्या रँक्स मी लग्नाआधीच माहित करून घेतल्या होत्या… बाबा म्हणालेच होते…’ बिपिन एक दिन बहुत बडे अफसर बनेंगे ! ‘ 

बिपिनजींचे वडील म्हणजे माझे सासरे लक्ष्मणसिंग रावत त्यावेळी लेफ्टनंट जनरल पदावर होते आणि भटिंडा येथे पोस्टेड होते. त्यामुळे माझी आणि बिपिनसाहेबांची एंगेजमेंट भटिंडा मिलिटरी कॅम्प मध्येच झाली. बिपिनसाहेब त्यावेळी कॅप्टन होते आणि सैन्य कारवायांच्या धकाधकीतून लग्नासाठी कशीबशी सुट्टी काढून आले होते ! आमचे शुभमंगल मात्र दिल्लीत झाले.. वर्ष होते १९८५ ! साहेबांचे पहिलं प्रेम म्हणजे आर्मी ! सुरूवातीला सवत वाटणारी आर्मी नंतर माझी लाडकी झाली. ‘ वन्स अ‍ॅन आर्मीमॅन… ऑल्वेज अ‍ॅन आर्मीमॅन ‘च्या चालीवर मीही आर्मी वुमन झाले. लग्नानंतर अगदी थोड्याच दिवसांत साहेब बॉर्डरवर रूजू झाले. संसाराच्या उंबऱ्यापेक्षा त्यांचं मन ‘लाईन ऑफ अ‍ॅक्च्युल कंट्रोल’वरच्या उंबऱ्यावर जास्त धाव घेई. मी सोबत जाण्याचा आग्रह केला की फक्त गोड हसायचे ! म्हणायचे “ एक म्यान में दो-दो तलवारे कैसे संभालू? “ त्यांचे सहकारी त्यांना ‘मॉस’ म्हणजे ‘ Married Officer Staying Single’ म्हणत असत. मॉस म्हणजे इंग्लिशमध्ये शेवाळं. A rolling stone does not gather moss असं म्हटलं जातं. म्हणजे सतत गडगडणा-या दगडावर शेवाळं साचत नाही. अर्थात सतत भटकत असलेल्या माणसावर फारशी जबाबदारी नसते. पण साहेबांचं मात्र तसं अजिबात नव्हतं. सतत शिकत राहणं, सतत धाडसी मोहिमा आखणं आणि त्यांचं नेतृत्व करणं हे त्यांच्या जणू स्वभावातच होतं. वडिलांच्याच बटालियनमध्ये पहिले पोस्टिंग झालेले ! तिथून जी पराक्रमाची घोडदौड सुरू झाली ती अगदी काल-परवापर्यंत म्हणजे अगदी भारताचे पहिले C. D. S. अर्थात ‘चीफ ऑफ़ डिफेन्स स्टाफ’ पदी निवड होईतोवर. त्यांच्या उण्यापु-या ३७ वर्षांच्या सैन्य-जीवनातील ३० वर्षांची मी साक्षीदार ! संसारवेलीवर फुलांसारख्या दोन मुली दिल्या देवाने ! अक्षरश: शेकडो धोकादायक, गुप्त सैनिकी-कारवायांमध्ये साहेब अगदी फ्रंटवर असत. पण त्याची झळ त्यांनी आमच्या संसाराला लागू दिली नाही. कश्मिरात आणि अन्य ठिकाणी पहाडांवर केलेल्या जीवावर बेतू शकणा-या काऊंटर इन्सर्जन्सी कारवाया, चीन सीमेवरचा विशिष्ट संघर्ष असो, सर्जिकल स्ट्राईक, म्यानमार कारवाई असो, साहेबांनी या कानाची खबर त्या कानाला लागू दिली नाही. सगळं यथासांग झाल्यावर वर्तमानपत्र, बातम्यांतून साहेबांचा पराक्रम कळायचा. पण काळजात काळजीचे ढगही दाटून यायचे. पण ते सीमेवर गुंतलेले असताना ‘नो न्यूज इज गुड न्यूज’ म्हणत दिवस ढकलायचे याची सवय झाली होती. कधी भारतीय सैनिक, अधिकारी युद्धात कामी आल्याच्या बातम्या आल्या की हृदय पिळवटून निघायचे ! त्यांच्या तरुण विधवांची समजूत काढता-काढता जीव कासावीस व्हायचा. आपल्याही कपाळीचं कुंकु असं अकाली विस्कटलं तर? हा विचार आत्म्यास चिरत जायचा ! साहेब जस-जसे मोठ्या पदांवर चढत गेले तस-तसे त्यांच्यासोबत राहण्याची संधी मिळत गेली. मुलींचे शिक्षण, त्यांचे विवाह इ. आघाडी सांभाळण्यात मी तरबेज झालेच होते. पण आता आणखी मोठा संसार करण्याची, नव्हे सावरण्याची जबाबदारी नशिबाने मिळाली. देशासाठी प्राणांची आहुती दिलेल्या जवानांच्या विधवा पत्नींना नुकसानभरपाईसोबत आणखीही काही हवं असतं. नव्हे, समाज त्यांचं देणं लागतो… मानसिक आधार, समुपदेशन आणि संसार सांभाळण्यासाठी आर्थिक पाठबळ देऊ शकेल असे व्यावसायिक कौशल्य-प्रशिक्षण ! त्यांच्या इतर समस्या तर वेगळ्याच. पण या कामात माझी मानसशास्त्रातील पदवी, मी आधी कॅन्सरपिडीतांसाठी केलेल्या कामाचा अनुभव, या बाबी मदतीला आल्या. जीव ओतून काम तर करतच होते.. एवढ्या मोठ्या सैन्य-अधिका-याची पत्नी… शोभली तर पाहिजेच ना? साहेबांनी देशात-परदेशात अनेक मानसन्मान मिळवले. त्यांना चार स्टार मिळाले होते.. आणि ते स्वत: एक स्टार… मिळून फाईव स्टार ! युनिफॉर्मवरील पदकांची चमक तर कुबेराचे डोळे दिपवणारी ! प्रदीर्घ सैन्यसेवा आणि प्रदीर्घ संसार… दोन्ही आघाड्यांवर बिपिनजी विजेता. दोन्ही मुली म्हणजे जीव की प्राण ! आणि मी? कर्तव्याच्या म्यानातली मी दुसरी तलवार असले तरी मला त्यांनी पहिल्या तलावारीच्या जखमा कधीच सोसायला लावल्या नाहीत. पहाडी युद्धातले तज्ज्ञ असलेले बिपिनजी माझ्यामागे पहाडासारखे उभे असत. मृत्यूशी मैत्रीपूर्ण संबंध असलेले बिपिन साहेब २०१५ मध्ये एका भयावह हेलिकॉप्टर अपघातात मृत्यूशी मिलिट्री-हँडशेक करून आलेले होते. परंतू पुढे कधीही हेलिकॉप्टरमध्ये बसायला कचरले नाहीत. ते मोहिमेवर निघाले की त्यांच्यासोबत जायचा हट्ट करावसा वाटे… पण ते शक्य व्हायचेच नाही. सेवानिवृत्ती झाली न झाली तोच भारतमातेच्या सेवेची महान जबाबदारी शिरावर येऊ घातली… ऑल्वेज अ सोल्जर या न्यायाने बिपिनजींनी ती स्विकारलीही. आता मात्र मला माझ्या साहेबांसोबत जाण्याचा अधिकार आणि संधीही मिळू लागली… आणि मी ती आनंदाने साधतही होते…. शिवाय मी AWWA (Army Wives Welfare Association) ची प्रमुखही झाले होते… साहेबांना आणि मलाही देशासाठी, सैनिकांसाठी, त्यांच्या विधवांसाठी, मुला-बाळांसाठी आणखी खूप काही करायचे होते… वैधव्य आणि एकाकीपणा कपाळी आलेल्या सैनिकपत्नींचे दु:ख मी जवळून अनुभवले होते. ती भिती मी अनुभवली होती… एकदा तसा प्रसंग माझ्यावर येता-येता राहिला होता. म्हणून मी सतत साहेबांसोबत राहण्याचा हट्ट धरत असे आणि तशी अधिकृत संधीही मला मिळत असे… ८ डिसेंबरलाही मी साहेबांसोबत होते… आणि आता त्यांच्यासोबतच अनंताच्या प्रवासाला निघाले आहे…. त्यांच्या हातात हात घालून !!! “ 

तो दुर्दैवी अपघात ८ डिसेंबर २०२१ रोजी घडला होता.

… सैनिक देशासाठी लढत असतात, बलिदान देत असतात. त्यांच्या कुटुंबियांचाही त्याग मोठा. भारतमातेचे वीर सुपुत्र बिपिनजी रावतसाहेब आणि त्यांच्या सहकाऱ्यांना भावपूर्ण नमन करताना रावतसाहेबांच्या धर्मपत्नी मधुलिका बाईसाहेबांनाही सॅल्यूट आणि भावपूर्ण श्रद्धांजली ! जय हिंद ! जय हिंद की सेना ! 

(उपलब्ध माहितीवरून, संदर्भावरून, जरूर त्या ठिकाणी काल्पनिकतेचा आधार घेऊन श्रद्धापूर्वक केलेले हे स्वलेखन) 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ त्याचं असं झालं… भाग-२- लेखक – डॉ. श्रीनिवास नाटेकर ☆ परिचय – डॉ. संदीप श्रोत्री ☆

डॉ. संदीप श्रोत्री

? इंद्रधनुष्य ?

 ☆ त्याचं असं झालं… भाग-२ – लेखक – डॉ. श्रीनिवास नाटेकर ☆ परिचय – डॉ. संदीप श्रोत्री ☆

(एक आगळ्या वेगळ्या पुस्तकाचा आगळा वेगळा परिचय)  

पुस्तक : त्या चं असं झालं

लेखक : डॉ. श्रीनिवास नाटेकर   

प्रकाशक : चतुरंग प्रकाशन 

पृष्ठ : 264 

किंमत :  रु. 200

त्याचं असं झालं,.. गप्पा रंगात आल्या होत्या, आम्ही तिघेजण होतो, समोरच्या व्यक्तीला मी म्हणले, ‘अण्णा, आमच्या डॉक्टरी व्यवसायात आम्हाला देखील खुपसे रांगडे अनुभव येतात, पण फारच थोडी डॉक्टर मंडळी ते शब्दबद्ध करतात, असे का बरे?’ अण्णा म्हणाले, आता मी गप्प बसतो, तुझ्याकडे आहे अशा अनुभवांचे गाठोडे, तू सांग तुझे अनुभव! पुढील तासभर मी बोलत होतो, अण्णा ऐकत होते, शांतपणे डोळे मिटून. त्या दोघांपैकी एक होता माझा नूमवी (ओउने) शाळेतील माझा जिगरी दोस्त गजानन सरपोतदार आणि दुसरे होते गजानन दिगंबर माडगुळकर अर्थात गदिमा!

त्याचं असं झालं,.. सांगलीमधील रक्तपेढीचा कार्यक्रम होता, त्यासाठी पाहुणे गाडीने येताना प्रवासात गाडीमधील एसी चालू होता, काचा बंद होत्या, अचानक काळा धूर येऊ लागला आणि आतमधील सर्वजण गुदमरू लागले. कशीबशी गाडी येऊन सांगलीत पोहोचली, तोपर्यंत सर्वजण उलटी, चक्कर आणि डोकेदुखीने त्रस्त झाले होते. मी जातीने उपचारात लक्ष घातले, रक्तपेढीचा कार्यक्रम संध्याकाळी सुरु झाला, बोलताना पाहुणे उभे राहिले, ‘खरे म्हणजे आम्ही स्वर्गाचे दार ठोठावले होते, दार उघडले नाही म्हणून परत आलो, रक्तदान करायच्या अगोदर देहदान करायची वेळ आली होती!’ श्रोत्याना ती एक शाब्दिक कोटी वाटली, पण मला ते कारण माहिती होते. ते पाहुणे होतेअर्थातच, भाई उर्फ पु लं देशपांडे!

त्याचं असं झालं,.. सांगलीमध्ये एक क्रिकेट मॅचसाठी महान क्रिकेटपटू आलेले होते. सकाळी रत्ना इंटरनॅशनल हॉटेलमधून फोन आला, मी गेलो, खोलीमध्ये तापाने फणफणलेला एक रुग्ण, त्याला तातडीने मुंबईला हलवायला पाहिजे होते. तत्काळ थेट (तत्कालीन) मुख्यमंत्री वसंतदादा पाटील ह्यांना फोन करून विचारले, कारण ते आणि त्यांचे विमान सांगलीमध्ये होते, त्याच विमानातून त्या रुग्णाची सोय मुंबईमध्ये जाण्यासाठी केली, तो रुग्ण होता साक्षात सुनील गावस्कर! 

त्याचं असं झालं,.. आम्ही दिल्लीला जाताना वाटेत भोपाळ स्टेशनवर थांबलो. स्टेशनवरील मध्यप्रदेश डेअरीच्या स्टॉलवर थंड दुधाची बाटली मिळते, ती आणायला मी उतरलो, समोर झब्बा, लेंगा उपरणे घातलेले एक गृहस्थ, मी ओळखले पटकन नमस्कार केला. नंतर त्यांनी जे सांगितले त्यामुळे मी गहिवरलो. ते म्हणाले, ’कालच रामचा फोन आला होता, तुम्ही याच रेल्वेने दिल्लीला चालला आहात, माझी गाडी दुसर्या प्लॅटफॉर्मवरून थोड्या वेळाने निघणार आहे, म्हणून तुम्हाला भेटायला आणि हा मिठाईचा पुडा घेऊन आलो आहे!’ अशी ती व्यक्ती होती पद्मविभूषण पंडित कुमार गंधर्व! 

त्याचं असं झालं,.. एकदा गाडीने मुंबईहून सांगलीला जात असताना चहा, नाष्टासाठी साताऱ्यात हॉटेल रजताद्रीमध्येन जाता शनिवार पेठेतील माझ्या मित्राच्या घरी गेलो. तो ओपीडीमध्ये होता, त्याने घरी शिरा-भजी-चहा करायला सांगितला आणि समोरच्या टेबलाखाली ठेवलेले चार-पाच एक्सरे काढले. प्रत्येक एक्सरे ठराविक दिवसांनी घेतलेला होता, मी एक्सरे तज्ञ असल्यामुळे त्याने मला दाखविले. सर्व काळजीपूर्वक बघितल्यावर मी फुफ्फुसाचा कर्करोग असल्याचे निदान केले. तो टीबी नसून कर्करोग होता. स्वतः एम डी डॉक्टर असणारा तो मित्र म्हणाला, अगदी बरोबर, मलाही तेच वाटत आहे. तू कॅन्फर्म केलेस. चहा-नाष्टा झाल्यावर मी सहज म्हणालो, कुणाचे एक्स रे आहेत रे ते?, त्यावर तो अतिशय शांतपणे म्हणाला, ‘माझेच!’ मी सुन्न! काही दिवसांचा सोबती असणारा तो प्रथितयश फिजिशियन म्हणजे सातारा शहरातील आजच्या जीवनज्योत रुग्णालयाचे एक संस्थापक, कै डॉ बाबा श्रीखंडे ! 

त्याचं असं झालं…

त्याचं असं झालं…

त्याचं असं झालं…

त्याचं असं झालं…

…… ही यादी त्याच्या आयुष्यात न संपणारी आहे.

आपसुकच मनामध्ये प्रश्न येतो की त्याचं ‘असं’ कसं झालं? आणि…

त्याचंच कसं झालं? हे रहस्य ओळखण्यासाठी आपण हे “ त्याचं असं झालं “ पुस्तक वाचले पाहिजे.

हा लेखक आहे, सांगलीमधील प्रख्यात रेडिऑलॉजीस्ट आणि माझे शिक्षक डॉ. श्रीनिवास नाटेकर.

पुस्तकाचे नाव – त्याचं असं झालं 

लेखक – डॉ श्रीनिवास नाटेकर 

प्रकाशन – चतुरंग

किंमत – रु २००/- 

हे पुस्तक वाचताना आपण विस्मयचकित होतो, की, एखाद्याच्या कुंडलीमध्ये विधाता काय काय ‘योगायोग’ भरून ठेवतो ?

कधी ती व्यक्ती दीर्घायुषी असते तर कधी अल्पायुषी, जन्माच्या स्टेशनवर आपण मृत्यूचे तिकीट घेऊन चढलेलो असतो. आपले उतरायचे स्टेशन कुठे येणार, कधी येणार हे आपल्याला माहीत नसते, काळाची ही रेल्वेगाडी चालूच असते, एकाच गतीने जात असते. आपण त्यामध्ये नुसतं बसून राहायचं की शेजारच्या सहप्रवाशांची गप्पा मारायच्या किंवा आणि काय लेखन, कला, साहित्य, चित्र काढत बसायचं हे आपलं आपण ठरवायचं असतं.

८५ वर्षाच्या या प्रवासामध्ये डॉ. नाटेकर सरांना वाटेत अनेक प्रवासी मित्रमैत्रिणी भेटले. काही वेळ भेटले, आपापल्या स्टेशनवर उतरून निघून गेले, पण त्यामध्ये होते ते प्रथितयश कवी, लेखक, हिंदी – मराठी सिनेसंगीतातील गायक, संगीतकार, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे खेळाडू, प्रख्यात उद्योजक, लोकप्रिय राजकारणी, आणखी किती नावे सांगू? ही यादी न संपणारी !

हे केवळ नशीब आहे.. का ही केवळ नियती आहे.. की योगायोग?

लेखक म्हणतात, “ परमेश्वराची कृपा असावी. “ परंतु मला असं वाटतं की ही लेखकाची एक तपश्चर्या असावी, समोरच्या व्यक्तीला न दुखवता त्याच्या हृदयामध्ये स्थान मिळवण्याची हातोटी असावी, लेखकाची ती एक कला असावी. आपणही अशा अनेक उत्तुंग व्यक्तीमत्वांच्या संपर्कात येत असतोच, परंतु आपल्याला ही कला नाही, म्हणून मला असे वाटते, की जर आपले चरित्र लिहायला घेतले तर त्याचे नाव द्यावे लागेल.. ‘ माझं हसं झालं ! ’

या पुस्तकात अशा अनंत आठवणी आहेत. मी स्वतः १९८२ ते १९९१ ह्या काळामध्ये मिरज वैद्यकीय महाविद्यालयात आणि सिव्हील हॉस्पिटल सांगली इथे होतो. त्या काळात आमच्या स्पोर्ट आणि एक्सरे पुरताच नाटेकर सरांशी संबंध आला. सरांनी घेतलेली एकनाथ सोलकर यांची मुलाखत आजही आठवते. प्रसिद्ध बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर हे सरांचे भाऊ. ह्या नाटेकरबंधूंचे बालपण पुणे, मुंबई येथे गेले. जात्याच अभ्यास आणि खेळात हुशार. शास्त्रीय संगीत, भावगीते, सिनेसंगीत आवडीचे. क्रिकेट, बॅडमिंटन, टेबल टेनिस आदि क्षेत्रामध्ये ह्या बंधूंचा खूप बोलबाला होता, त्यामुळे त्यांची उठबस होती ती अतिशय उच्चभ्रू वर्गात… त्या ह्या आठवणी !

या पुस्तकाचे हेच वैशिष्ट्य आहे की याला अनुक्रमणिका नसली तरी चालते. कोणतेही पान केव्हाही उघडावं आणि वाचत बसावे.. वाचव असता हसावं, चकित व्हावं. मी तर सांगितली ही नुसती झलक. हे पुस्तक सध्या छापील स्वरुपात विक्रीस उपलब्ध नाही. परंतु किंडल किंवा ई बुक उपलब्ध आहे.

डॉ नाटेकर सरांचा whats app नंबर मुद्दाम देत आहे. (8055771552) त्यांनाही आपला अभिप्राय जरूर कळवावा.

डॉ. श्रीनिवास नाटेकर यांचे हे पुस्तक – “ त्याचं असं झालं…” विकिमिडिया कॉमन्सवर सर्वांसाठी मुक्त उपलब्ध झाले आहे. ( https://w. wiki/4chA ) 

– समाप्त – 

© डॉ. संदीप गजानन श्रोत्री

(सरांचा एक विद्यार्थी )

सातारा 

मो 9822058583

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ त्याचं असं झालं… भाग-१- लेखक – डॉ. श्रीनिवास नाटेकर ☆ परिचय – डॉ. संदीप श्रोत्री ☆

डॉ. संदीप श्रोत्री

परिचय

शिक्षण – MBBS.MS. FIAGES. (लॅप्रास्कोपी व जी आय एंडोस्कोपी सर्जन.सातारा.)

फाउंडर सेक्रेटरी, सातारा सर्जिकल सोसायटी, फाउंडर सेक्रेटरी,असोसिएशन ऑफ हाॅस्पिटल ओनर्स, वैद्यकीय क्षेत्रातील अनेक संस्थांचे पदाधिकारी. तसेच या क्षेत्रातून सामाजिक सेवेचे उपक्रम यशस्वी रित्या राबवले आहेत.

कार्य व सन्मान:

  • संस्थापक, रानवाटा निसर्ग आणि पर्यावरण संवर्धन मंडळ, सातारा
  • दुर्ग साहित्य संमेलनांचे आयोजन व सक्रीय सहभाग
  • वन्य लोकसंस्कृती व जैव विविधता यांच्या संवर्धनासाठी अनेक प्रकारे जनजागृती
  • डोंगर पठारावरील वनस्पतीत व पक्षी यांचा विशेष अभ्यास
  • हिमालय ट्रेकिंग मोहिम… सहभाग व लेखन
  • पक्षीनिरीक्षण, आकाशदर्शन, वृक्षारोपण, जलसंधारण यावर व्याख्याने,स्लाईड शो, वृत्तपत्रीय लेखन
  • वसंत व्याख्यानमाला, पुणे
  • निमंत्रित विख्यात :  इंडिया क्लब, दुबई येथे मराठी राजभाषा दिनानिमित्त व्याख्यान… “माझी भटकंती” इत्यादी
  • अध्यक्ष, तिसरे ‘ शिवार ‘ साहित्य संमेलन. इत्यादी

पुरस्कार

वसुंधरा पर्यावरण पुरस्कार, किर्लोस्कर वसुंधरा सन्मान, कोयना निसर्ग मित्र पुरस्कार, द. महाराष्ट्र साहित्य पुरस्कार, मुंबई मराठी प्रवासी संघटना पुरस्कार, गिरिमित्र सन्मान पुरस्कार, आपटे वाचन मंदिर, इचलकरंजी(कासवाचे बेट),  वसुंधरा रत्न राज्यस्तरीय पुरस्कार (कासवाचे बेट),  श्री स्थानक ठाणे मराठी ग्रंथालय पुरस्कार (उत्कृष्ट प्रवास वर्णन), धन्वंतरी पुरस्कार, महाराष्ट्र. राज्य साहित्य व सांस्कृतिक मंडळ यांचा यशवंतराव चव्हाण पुरस्कार (कासवाचे बेट)

प्रकाशित साहित्य

एव्हरेस्टच्या पायथ्याशी, पुष्पपठार कास, मार्क इंग्लिस, साद अन्नपूर्णेची, काटेरी केनियाची मुलायम सफर, दुर्ग महाराष्ट्रातील, कासवांचे बेट, मनू राष्ट्रीय अरण्य, इंकांची देवनगरी, रहस्यमय पेरु, निसर्ग गुपिते भाग १, सातशे पेक्षा जास्त लेखांचे विविध माध्यमातून प्रकाशन

? इंद्रधनुष्य ?

☆ त्याचं असं झालं… भाग-१ – लेखक – डॉ. श्रीनिवास नाटेकर ☆ परिचय – डॉ. संदीप श्रोत्री ☆

(एक आगळ्या वेगळ्या पुस्तकाचा आगळा वेगळा परिचय)  

पुस्तक : त्या चं असं झालं

लेखक : डॉ. श्रीनिवास नाटेकर   

प्रकाशक : चतुरंग प्रकाशन 

पृष्ठ : 264 

किंमत :  रु. 150

त्याचं असं झालं, .. मी एकदा दुपारी सांगली मधील क्लिनिकमध्ये बसलो होतो, मला मिरज येथील प्रसिद्ध कान नाक घसा तज्ञ डॉ डी के गोसावी यांच्याकडून फक्त ‘एक व्ही आय पी रुग्ण’ येणार आहे, इतकेच माहिती होते, आणि त्या मागील दराने आत येतील. बरोबर साडे तीन वाजता मागील दारात एक गाडी थांबली, गाडीतून पांढरीशुभ्र साडी नेसलेली एक शालीन, डोक्यावरून पदर घेतलेली, नम्र स्त्री उतरली, तिने तिच्या जगप्रसिद्ध खळाळत्या हास्यमय आवाजात सांगितले, ‘नमस्कार डॉक्टर साहेब, माझाच छातीचा एक्स रे काढायचा आहे!’ अंदाजे तासभर ती माझ्या क्लिनिक मध्ये होती. एकूण आठ एक्सरे मला काढायला लागले. त्या दरम्यान माझ्या गाण्याच्या आवडीमुळे आमच्या गप्पा चांगल्या रंगल्या, इतक्या कि ‘सैंया’ चित्रपटातील ‘काली काली रात रे, बडा सताये, तेरी याद में..’ हे गाणे आठवून आम्ही दोघांनी मिळून एकसुरात गुणगुणलो! ती होती गान कोकिळा, स्वरशारदा लता मंगेशकर !

त्याचं असं झालं, .. दुपारी डॉ डी के गोसावी यांचा फोन आला, त्यांच्या मिरज येथील फार्म हाउस वर गप्पा मारायला संध्याकाळी बोलावले होते. मी वेळेवर गेलो, टेबलावर स्कॉच आणि तीन ग्लास ठेवलेले होते, एक अस्ताव्यस्त केस वाढवलेला गोरापान लहान चणीचा माणूस बसला होता. डॉक्टरांनी ओळख करून दिली, हे कविवर्य बा भ बोरकर!

त्याचं असं झालं, .. ती व्यक्ती दोन वेळा माझ्या घरी राहिली होती, तोंडात पान सतत असल्यामुळे ओठाचा चंबू, चणीने लहान, बुटके, गोल चेहरा, गोबरे गाल. त्यांचा एक्स रे छातीचा मी बघितला आणि म्हणले, ‘एक फुफ्फुस अर्ध्यापेक्षा जास्त निकामी, दुसरे देखील हवेचे फुगे झाल्यामुळे (एम्फिझिमा) लवकरच कामातून बाद होणार! तरिही ते गात होते, तासंतास! त्यांचे नाव पंडित कुमार गंधर्व ! 

त्याचं असं झालं, .. मिरज रेल्वे स्टेशनवर मित्राला सोडायला गेलो होतो, खूप गर्दीमध्ये पाठीवर थाप पडली, मागे वळून बघितले तर दोन मित्र होते, त्यांना मुंबईला जायचे होते. इथे रेल्वे बदलावी लागायची, महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये त्यांना जागा मिळत नव्हती. रिझर्वेशन केले नव्हते, अगदी काकुळतीला येऊन त्यांनी मदतीसाठी विचारले. त्याचवेळी माझा मित्र असलेला आमदार विक्रम घाटगे भेटला, त्यांने दोन बर्थ मिळवून दिले, त्या दोघांपैकी एक होता माझा खास मित्र मुकुंद जोशी आणि दुसरा होता आमचा मित्र सुनील गावस्कर!

त्याचं असं झालं, ..  एकदा सांगली सिव्हील हॉस्पिटलसाठी एकस रे मशीन खरेदी करण्यासाठी मुंबईमध्ये गेलो होतो, कामे आटोपून सचिवालयाजवळ फिरत असताना समोर स्टेट बँकेची इमारत होती, नुकताच आपल्या क्रिकेट टीमने इंग्लंडमध्ये जाऊन त्यांच्यावर विजय मिळविला होता. सहज म्हणून वर गेलो. केबिनबाहेरील सेक्रेटरीकडे ‘ओल्ड फ्रेंड’ म्हणले आणि स्वतःचे नाव न लिहिता चिठ्ठी दिली, आतून ती व्यक्ती स्वतः बाहेर आली, दार उघडल्याक्षणी मला मिठी मारून विचारले, ‘काय श्री, काय म्हणतोस?’ ती व्यक्ती होती, भारताचा यशस्वी कर्णधार अजित वाडेकर ! 

त्याचं असं झालं, .. सांगलीच्या पोलीस सांस्कृतिक भवनाच्या हॉलमध्ये माडीवर व्हरांड्यात मोडकळीस आलेल्या दोन खुर्च्या हाताने साफ करून दोन व्यक्ती बसल्या होत्या, एका पोलिसाने आणलेल्या मळकट किटलीमधून दोन कप चहाचे भरले, ते कप देखील कळकट आणि टवके उडालेले होते, चहा आणि बिस्कीट खात गप्पा मारत बसलेल्या त्या दोन व्यक्तिपैकी एक म्हणजे मी होतो, आणि दुसरी व्यक्ती होती भारताचे माजी  पंतप्रधान चौधरी चरणसिंग!

त्याचं असं झालं, ..  एकदा सकाळी माझे मित्र माधवराव आपटे यांचा फोन आला, लगेच विलिंग्डन क्लब वर ये, आम्ही तिघे आहोत, चौथा पार्टनर हवा आहे. मी गेलो. हातात रॅकेट, पायात महागडे बूट घालून माझी वाट पाहणारे ते होते प्रसिद्ध उद्योगपती  श्री आदित्य बिर्ला! 

त्याचं असं झालं, ..  सांगलीमध्ये एकदा १९९४ साली प्रभाताई कुलकर्णी यांच्या एका कारखान्याचा उद्घाटन समारंभ होता. सूत्रसंचालन मी करणार होतो, माझ्या इंग्रजी संभाषण कलेमुळे कारखाना दाखवण्याची जबाबदारी देखील माझीच होती. पाहुणे आले. समारंभ छान पार पडला, शेवटी पाहुण्यांनी माझी ओळख झाल्यावर एकाच वाक्य म्हणले, ‘नेव्हर इमाजिंन्ड यु आर अ मेडिकल डॉक्टर!’ ती व्यक्ती होती,  श्री रतन टाटा!

त्याचं असं झालं, ..  घरीच संध्याकाळी गप्पा रंगात आल्या होत्या, समोरची व्यक्ती सांगत होती, ‘आमच्या वाटेला हिरॉईन कधी येत नाही, येतात त्या मर्कटचेष्टा करणाऱ्या बारबाला, स्कॉच बाटलीमधील कोरा काळा कडू चहा आम्हाला प्यावा लागतो आणि झिंगावे लागते खोटे खोटे ! आम्ही पडलो व्हिलन, आमच्या गोळीबारात कधी कुणी मारत नाही, उलट हिरोच्या मात्र प्रत्येक गोळीने एकेक मुडदा पडतो.’ ती व्यक्ती होती सदाशिव अमरापूरकर!

त्याचं असं झालं, ..  माझा मित्र डॉ आडिगा याचा फोन आला, आज रात्री साडेसात वाजता घरी जेवायला यायचे आहे. मी सात वाजून सत्तावीस मिनिटांनी पोहोचलो. तिसर्या मजल्यावरील खोलीत तीन खुर्च्या होत्या, टेबलावर ‘जॉनी वॉकर’ होती, समोरच्या खुर्चीत एक वृद्ध सद्गृहस्थ बसले होते, गोरेपान, तुळतुळीत टक्कल, भुरभुरणारे किरकोळ पांढरे केस, सोनेरी काडीचा चष्मा, झब्बा आणि त्यावर असणारी सोनेरी बटणे.  ते होते ओंकारप्रसाद उर्फ ओ पी नय्यर! 

त्याचं असं झालं, ..  घरी ‘काका’ आले होते, गप्पांना सुरुवात होणार, तितक्यात लेदर बॅगमध्ये हात घालता घालता काका म्हणाले, ‘चला संध्येची वेळ झाली’, मी म्हणले, ‘काका तुम्ही माझ्या घरी आहात, तेंव्हा व्हिस्की माझी!’  गप्पा रंगात येत असताना मध्येच काका ओरडून माझ्या बायकोला सांगतात, ‘सुधाताई, आमचं अमृतप्राशन झाल ग, आता वाढ!’ मला वाटले, काका स्वतःच्या कवितेतील अनुभूती आणि त्यांचा जन्म उलगडून सांगत होते, त्यावेळी त्या ग्लासमध्ये जे काही असते, ती दारू नसतीच, ते असते अमृत! आणि काका म्हणजे साक्षात कविवर्य ‘मंगेश पाडगावकर’!

त्याचं असं झालं, ..  बंगल्याच्या दारात एक मर्सिडीज गाडी उभी होती, पांढरीशुभ्र लुंगी आणि नुकतीच अंघोळ केलेला उघडाबंब तुकतुकीत देह सांभाळत ती व्यक्ती मनापासून गाडी धूत आणि पुसत बसली होती. मीही त्यांच्याबरोबर हातात फडके घेतले आणि ती गाडी पुसायला लागलो. सकाळची वेळ, त्या वेळी दूरदर्शनवर रामायण मालिका सुरु होती. आमच्या घरात आणि आसपासच्या बंगल्यातदेखील त्याचा आवाज मोठा असल्यामुळे आमच्यापर्यंत येत होता. रविंद्र जैन यांचे संगीत रामायण मालिकेमध्ये भरपूर आहे. विविध प्रसंगात विविध रागांचा वापर केल्यामुळे मालिकेमध्ये रंगत आली आहे. तिकडे तो राग ऐकला कि गाडी धुता धुता इकडे ती व्यक्ती त्या रागांचे विस्तारण करून, विडंबन करत गंमतजमत करून गात होती. तिकडे रामायण संपले, इकडे गाडी स्वच्छ धुवून झाली, मी ऐकत होतो आणि गाणारी व्यक्ती होती, ‘पंडित भीमसेन जोशी !’ 

  – क्रमशः भाग पहिला 

© डॉ. संदीप गजानन श्रोत्री,

सातारा 

मो 9822058583

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares