मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ राग बायकोचा…. फायदा जगाचा ! – लेखक :  डॉ. धनंजय देशपांडे (dd) ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? इंद्रधनुष्य ?

राग बायकोचा…. फायदा जगाचा !लेखक :  डॉ. धनंजय देशपांडे (dd) ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर

(एक सत्यकथा)

श्री. सुंदर पिचाई 

राग बायकोचा…. फायदा जगाचा  !

हसू नका…. खरेच हे सत्य आहे. गोष्ट आहे 2004 सालची ! 

आताचे गुगल कंपनीचे सीईओ सुंदर पिचाई त्याकाळात अमेरिकेत करियर करण्यासाठी संघर्ष करत होते. धडपड सुरु होती. 

तर एकदा त्यांच्या तिथल्या परिचित फॅमिलीने याना जेवायला बोलावलं. 

सुंदरने हि गोष्ट आपल्या पत्नीला फोन करून सांगितली अन म्हणाले की, “असं करूया… मी ऑफिसातून कामे आटोपून परस्पर त्या मित्राच्या घरी येतो. तू आपल्या घरून आवरून वगैरे थेट तिकडेच ये. परत येताना मग आपण एकत्र येऊ”

जेवणाची वेळ रात्री आठची ठरली होती. त्याप्रमाणे मिसेस पिचाई वेळेत सर्व आवरून त्या फॅमिलीच्या घरी बरोबर आठ वाजता पोचल्या. तिकडून श्री सुंदर जी सुद्धा सगळं आवरून ऑफिसातून निघाले मात्र वाटेत गडबड झाली आणि ते रस्ता चुकले. त्यामुळे मग इतर लोकांना पत्ता विचारत विचारत त्यांना मित्राच्या घरी पोचायला दहा वाजले. तब्बल दोन तास उशीर. 

आणि तिथं गेल्यावर कळलं की, यांची वाट पाहून शेवटी कंटाळून त्यांच्या पत्नीने जेवण करून तिथून निघून घर गाठलं होत. हे कळल्यावर सुंदर अजूनच कचाट्यात अडकले की आता घरी बायकोसमोर कसे जायचे ? यजमान पण खरेतर मनातून नाराज झालेले. मात्र प्रोटोकॉल म्हणून त्यांनी कसेबसे याना जेवायला आग्रह केला मात्र सुंदरचा मूड नव्हता. मित्राला “सॉरी” असं म्हणत त्यांनी तिथून तसेच न जेवता काढता पाय घेतला. 

अमेरिकेत वेळ न पाळणे यासारखा दुसरा अपराध नाही, असं मानलं जाते.

घरी पोचल्यावर पत्नीने त्यांना जाम फैलावर घेतलं. पार उलटी सुलटी हजामत तीही जणू बिनपाण्याने ! “तुमच्या अशा लेट येण्याने चार लोकात माझी किती फजिती झालीय याची कल्पना नाहीय तुम्हाला” असा तोंडाचा दांडपट्टा सुरु होता. 

वातावरण खूपच तापलेलं पाहून सुंदर पिचाई यांनी तिथून काढता पाय घेतला आणि सरळ आपलं ऑफिस गाठलं.

रात्रभर ते जागेच होते…. एकच विचार करत की, मी रस्ता चुकलो अन लेट झाला. आणि पुढे इतकं रामायण घडलं. माझ्यासारखेच अनेक लोक असतील ज्यांना हा त्रास सोसावा लागत असेल. 

अशी काहीतरी सोय असायला हवी की कुणीच कधीच रस्ता चुकणार नाही. आणि हा विचार करत असतानाच पहाटे त्यांच्या डोक्यात एकदम विचार आला की, जर खिशात रस्त्याचा नकाशा असेल तर योग्य मार्गदर्शन मिळालं असत अन मी रस्ता चुकलो नसतो. 

दुसऱ्या दिवशी सकाळी सुंदर पिचाई यांनी आपल्या संपूर्ण टीमची मिटिंग बोलावली आणि नकाशा बनवण्याची आपली आयडिया सांगितली. मात्र या आयडिया बद्दल कुणीच स्वागतोत्सुक नव्हते उलट “असं शक्य नाही” हाच मूड सगळ्याचा होता. मात्र सलग दोन दिवस सुंदर त्यांच्याशी बोलत होते ! नकाशा स्कीम बद्दल समजून सांगत होते. आणि शेवटी त्यांनी याच टीम कडून असं एक सॉफ्टवेयर बनवून घेतलं जे लोकांना योग्य तो रस्ता दाखवेल. 

.. आणि अथक श्रमातून या टीमने 2005 सालात गुगल मॅप बनवून अमेरिकेत सर्वप्रथम लॉन्च केले. पुढच्या वर्षी इंग्लंड मध्ये आणि 2008 मध्ये भारतात गुगल मॅप ऍप्लिकेशन लॉन्च करण्यात आले. 

आणि आज त्या गुगल मॅपची उपयुक्तता संपूर्ण जगाला उमजली आहे. गुगल मॅप म्हणजे जणू सर्वासाठी घराबाहेर पडल्या क्षणापासूनच “वाटाड्या” चे काम करत आहे. विशेष म्हणजे त्याचे न ऐकता तुम्ही वेगळ्या रस्त्याने हट्टाने जायचे ठरवलं तरी तो गुगल मॅप (निवेदिका बाई) रागावत नाही तर तुम्हाला पुन्हा “रिरूट” करून देऊन योग्य मार्गावर आणते. एका पाहणीनुसार जगातील प्रत्येक सातव्या माणसामागे एक माणूस आजकाल गुगल मॅप वापरतो आहे. 

कळलं ? राग बायकोचा पण फायदा जगाचा !! कसा झाला ते ?

डॉ. डीडी क्लास : कधी कोणती घटना जगाला एक वेगळेच वळण देईल हे कधी सांगता येत नाही. बायकोने रागावणे हि घटना जगात काही पहिल्यांदा सुन्दर यांच्या घरी घडली असं नाही. त्याच्या कैक हजारो वर्ष आधीपासून हि घटना जगात घडत आलीय की ! पण सुंदरच्या घरी घडली आणि त्यांनी या घटनेतून पॉजिटीव्ह विचार केला अन त्यातून जगाला गुगल मॅप मिळाला. तसे तर झाडावरचे सफरचंद आधीपण खाली पडत होतेच की ! मात्र न्यूटनच्या डोक्यावर पडले अन त्यातून जगाला गुरुत्वाकर्षण म्हणजे काय ते कळलं ! सांगायचं इतकंच की, महान लोकांचे हे सगळं पाहून आपल्याही आयुष्यात असं काही घडलं तर त्यातून पॉजिटीव्ह पाहून त्यावर काम करावे. न जाणो त्यातून वेगळं काहीतरी सापडेल जे पूर्ण जगाला जाऊ द्या पण किमान तुमच्या जवळच्या चार लोकांना वेगळा प्रकाश मिळाला तरी खूप झालं न ! 

शिवाय ते “रिरूट” बद्दल पण लक्षात ठेवा. नकळत आपण रस्ता चुकलो तर न रागावता पुन्हा तुम्हाला “रिरूट” करत ती गुगलवाली बाई जसे मूळ उद्देशाकडे नेते तसेच आपण कधी नकळत आपला रस्ता (म्हणजेच ध्येय) भटकलो तर चिडू नका. रागावू नका. शांतपणे पुन्हा “रिरूट” करून ध्येयापर्यंत कसे जाता येईल ते पहा! 

खूप फरक पडेल जगण्यात हो ! (आणि कधीकाळी चुकून बायको रागावलीच तर जास्त हर्ट करून घेऊ नका. कदाचित तुमच्या हातून छान काहीतरी घडावं म्हणून ती तसे बोलली असेल असं समजून पुढं सरका…. कामाला लागा) @ DD

लेखक :  डॉ. धनंजय देशपांडे (dd)

प्रस्तुती : अमोल केळकर 

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ शौर्य गाथा : हुतात्मा मेजर सोमनाथ शर्मा – अंग्रेजी लेखक : अज्ञात ☆ स्वैर मराठी अनुवाद – श्री मेघःशाम सोनवणे ☆

श्री मेघःशाम सोनवणे

? इंद्रधनुष्य ?

☆ शौर्य गाथा : हुतात्मा मेजर सोमनाथ शर्मा – अंग्रेजी लेखक : अज्ञात ☆ स्वैर मराठी अनुवाद – श्री मेघःशाम सोनवणे

शौर्य गाथा – – मेजर सोमनाथ शर्मा,

भारताचे पहिले परमवीर चक्र विजेते, मेजर सोमनाथ शर्मा, १९४७ च्या युद्धाचे नायक.

मागील शतकात भारताने बऱीच युद्धं पाहिली होती. भारतीय सैनिकांनी स्वातंत्र्यापुर्वी पहिल्या व दुसऱ्या विश्वयुद्धात भाग घेतला होता. ‌

फाळणीनंतर भारताने पाकिस्तान शी चार वेळा आणि एकदा चीन सोबत युद्ध लढले होते. या युद्धांमध्ये आपल्याला बरेच चांगले योद्धे गमवावे लागले होते. काही सैनिकांचा त्यांच्या कामगीरीबद्दल विशेष उल्लेख होणे हा त्यांचा हक्क आहे.

असेच एक सैनिक मेजर सोमनाथ शर्मा हे होते ज्यांना भारताचा सर्वोच्च सैन्य सन्मान, भारतीय सैन्य इतिहासात सर्वात पहिले परम् वीर चक्र देवून गौरविण्यात आले.

काय योगायोग आहे पहा, मेजर जनरल विक्रम रामजी खानोलकर यांच्या पत्नी सावित्री खानोलकर, ज्यांनी भारतीय सैन्यासाठी ब्रिटन च्या व्हिक्टोरिया क्राॅस च्या तोडीचे ‘परम् वीर चक्र’ पदकाचे प्रारुप (डिझाईन) बनवले, त्यांचे मेजर सोमनाथ शर्मा हे जावई होते.

मेजर सोमनाथ शर्मा यांचा जन्म ३१ जानेवारी १९२३ रोजी हिमाचल प्रदेशातील दाढ, कांडा येथील ब्राम्हण कुटुंबात झाला. ते एका विख्यात सैनिक परिवाराचे सदस्य होते. त्यांचे वडील मेजर जनरल अमरनाथ शर्मा जे सैन्याचे मेडीकल सर्विसेसचे डायरेक्टर म्हणून निवृत्त झाले. त्यांचे बंधू लेफ्टनंट जनरल सुरेंद्रनाथ शर्मा हे इंजीनियर- इन-चीफ म्हणून निवृत्त झाले आणि दुसरे बंधू जनरल विश्वनाथ शर्मा हे भारताचे सरसेनापती (१९८८-१९९०) आणि त्यांची बहिण मेजर कमला तिवारी या सैन्याच्या वैद्यकीय विभागात डाॅक्टर होत्या.

मेजर सोमनाथ शर्मा यांना 19 व्या हैदराबाद रेजीमेंटच्या आठव्या बटालियन (नंतरची कुमाऊँ रेजीमेंट ची चौथी बटालियन), (तेव्हाच्या ब्रिटीश इंडीयन आर्मी) मध्ये वयाच्या एकोणिसाव्या वर्षी अधिकारी म्हणून २२ फेब्रुवारी १९४२ रोजी रुजू झाले. दुसऱ्या महायुद्धाच्या अरकान मोहिमेदरम्यान त्यांनी युद्धात भाग ही घेतला होता.

३१ ऑक्टोबर १९४७ रोजी सोमनाथ शर्मा यांच्या कंपनी ला विमानाने श्रीनगर येथे आणण्यात आले. आधी हाॅकी खेळत असतांना उजव्या हाताला दुखापत झाल्याने त्यावर प्लॅस्टर चढविलेले होते तरीही युद्धात आपल्या कंपनीबरोबरच रहाण्याची त्यांची मागणी मान्य करीत परवानगी देण्यात आली.

या मोहिमेत मेजर सोमनाथ शर्मा यांच्या कुमाऊँ रेजीमेंटच्या चौथ्या बटालियनच्या डी कंपनीला काश्मीर खोऱ्यातील बडगाम या गावी सुरक्षेसाठी गस्त घालण्यासाठी आदेश देण्यात आला. ते त्यांच्या तुकडीसह शत्रूने तिन बाजूंनी घेरले गेले व शत्रूसैन्य संख्येने जास्त असल्याने त्यांच्या तुकडीला मोठे नुकसान सहन करावे लागले.

त्यांच्या लक्षात आले की ते व त्यांच्या सैनिकांनी ती पोस्ट सोडली तर श्रीनगर विमानतळ व श्रीनगर शहर शत्रूसैन्याच्या ताब्यात जाणार होते. त्यांनी आपल्या सैनिकांना रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत लढण्यास सांगितले. शत्रूच्या सात सैनिकांना आपला एक, इतकी संख्या घटूनही ते आणि त्यांची कंपनी हत्यार टाकायला तयार नव्हती आणि आपल्या सैनिकांना ते शौर्याने लढा देण्यास प्रोत्साहित करीत होते.

सैनिकांची संख्या कमी झाल्याने गोळीबार करण्याचा वेग मंदावला होता. त्यांचा हात प्लॅस्टर मध्ये असूनही बंदुकांमध्ये गोळ्या भरण्याचे काम त्यांनी त्यांचेकडे घेतले. बंदुकांमध्ये गोळ्या भरून सैनिकांना देऊ लागले व स्वतः लाईट मशीन गन चा ताबा घेतला.

ते शत्रूशी लढण्यात मग्न असतांनाच त्याच्याजवळच्या गोळ्यांच्या साठ्यावर एक बाॅम्ब येऊन फुटला व त्यात त्यांना वीरमरण आले. त्यांच्या ब्रिगेड मुख्यालयाला पाठविलेल्या आवाजी संदेशात ते म्हणाले, “शत्रू आमच्यापासून पन्नास फुटांवर आहे, आणि आमची संख्या कमालीची घटली आहे. तरीही आम्ही एक इंचही माघार घेणार नाही पण आम्ही शेवटचा माणूस आणि शेवटची गोळी शिल्लक असेपर्यंत लढणार आहोत. “

त्यांनी जी हिम्मत, नेतृत्व व शौर्य दाखवत शत्रूसैन्याला सहा तास रोखून धरले ज्यामुळे भारतीय सैनिकांना घेऊन भारतीय हवाई दलाच्या विमानांना श्रीनगर विमानतळावर उतरता आले व श्रीनगर शहर आणि विमानतळावर ताबा मिळवण्याचे शत्रूचे मनोरथ धूळीस मिळवले.

स्वतः जखमी असूनही वयाच्या चोविसाव्या वर्षी अतुलनीय शौर्य, नेतृत्वगुण, सैनिकांचे मनोबल उंचावत ठेवून देशरक्षणासाठी हौतात्म्य पत्करले म्हणून त्यांना भारताचे पहिले ‘परम् वीर चक्र’ पदक (मरणोपरांत) देऊन सन्मानित करण्यात आले. हे वीर जवान, तुझे सलाम। 🇮🇳

मुळ इंग्रजी लेखक- अनामिक.

मराठी अनुवाद – मेघःशाम सोनवणे.

मो 9325927222

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “बोध दिवाळीचा – – –” ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

? इंद्रधनुष्य ?

☆ “बोध दिवाळीचा – – –☆ श्री जगदीश काबरे ☆

विवेकी विचार मनी धरा 

हाच दिवाळीचा बोध खरा–

विवेकी :  फटाके-मुक्त दिवाळी साजरी करा. फटाक्यामुळे प्रदूषण होते.

धर्मांध :  का? 😡 आम्ही फटाके फोडणारच. 💥 कारखाने, गाड्या, यंत्रे या मुळे होणारे प्रदूषण तुम्हाला दिसत नाही. आम्ही हिंदुनी ४ दिवस फटाके फोडले की तुम्ही बोंबा मारता. हिंदुद्वेषी कुठले!

विवेकी :  कारखाने, गाड्या, यंत्रे या मुळे प्रदूषण होते हे खरे आहे; पण ते चालू असल्यामुळे आपल्याला कित्येक सुख-सुविधा मिळतात, त्यामुळे ते अपरिहार्य असले तरी तेही प्रदूषण कमी करण्याचे प्रयत्न चालू आहेत. आणि फटाके फक्त दिवाळीतच नाहीतर पूर्ण वर्षभर क्रिकेट, निवडणूक, लग्न, वाढदिवसाला फोडले जातात. फटाका फोडल्यामुळे काय फायदा होतो याचे एकतरी उदाहरण तू देवू शकतोस का?

धर्मांध : (थोड्या वेळ गप्प) उदाहरण द्यायची आम्हाला गरज नाही. आम्हाला फटाके फोडताना आनंद होतो. फटाके फोडणे ही जुनी हिंदू संस्कृती आहे… आमची परंपरा आहेे. हिंदूंचा आनंद हिरावला तर याद राखा 💪कानाखाली “शिवसूर्यजाळ” काढू. 😡

विवेकी :  हा अहंकारच माणसाला रसातळाला नेतोय. खरंच या प्रदूषणामुळे सूर्यच एक दिवस असा सूर्यजाळ काढेल की, तुम्ही-आम्ही “मेलो” म्हणायलाही शिल्लक राहणार नाही. फटाका फोडल्याने स्वतःचे तसेच आपल्या अवतीभोवतीच्या अनेक लोकांचे नुकसान होते. तरीही तुला आनंद होणार असेल तर तो आनंद विकृत आनंद आहे. आणि मला सांग, हिंदूंच्या कोणत्या धर्म ग्रंथात दिवाळीत फटाके फोडावेत असे लिहिले आहे? खरे तर फटाके फोडणे ही आपली हिंदू संस्कृती नाही. ही विकृती चीन देशातून आपल्याकडे आली. जुनी वैगरे काही नाही. 150 वर्षापूर्वी भारतीयांना आजचे रासायनिक फटाके माहीतच नव्हते, हे तुला माहित आहे काय? मग परकीय चुकीची परंपरा आपण का स्वीकारायची? महत्वाचे म्हणजे फटाक्याचा उगम चीन मधला आहे. चीन मध्ये अतृप्त आत्मा ड्रॅगनसारखे प्राणी, भूते यांना पळवून लावण्यासाठी फटाक्यांचा वापर करीत. या मागील अंधश्रध्देला आपण पुरस्कृत करायचे का? याचाही विचार केला पाहिजे.

धर्मांध :  खरंच की, मला हे माहितच नव्हतं! 😳 असा मी विचारच केला नव्हता!! 🙀

विवेकी : फटाके फोडल्यामुळे ध्वनी-वायू प्रदूषण होते. फटाक्यांच्या कारखान्यांमध्ये मालमजूर वापरले जातात त्या बेकायदेशीर बाल-मजुरीला आपण नकळत प्रोत्साहन देतो. त्यांचे अनेक अपघात होतात, दरवर्षी सुमारे ५०० कोटी रुपयांची चक्क राखरांगोळी होते. 🔥पर्यावरणाची हानी होते ती वेगळीच. हे आहेत फटाक्याचे १००% दुष्परीणाम! हवा, पाणी, जमीन ही आपली राष्ट्रीय संपत्ती आहे. ती संपत्ती फटाक्याने प्रदूषित होते. त्याला विरोध करणे हे आपले कर्तव्यच नाही काय? म्हणूनच हिंदुत्ववादी सरकारातील फडणवीस-शिंदेसुद्धा आता फटाके मुक्त दिवाळी साजरी करा, असे आवाहन करत आहेत. आपणच आपल्या राष्ट्रीय संपत्तीचे रक्षण करायला हवे की नको? तसेच फटाका जाळणे म्हणजे पैशाचा दुरुपयोग करणे… कचरा करणे होय. सगळ्यात महत्त्वाचे आपल्या क्षणिक आनंदासाठी संपूर्ण समाजाला वेठीस धरण्याचा अधिकार आपल्याला कोणी दिला? परदेशात फटाके वाजविण्यावर बरेच निर्बंध आहेत. कारण त्यांना त्याचे दुष्परिणाम माहित झाले आहेत. त्याएवजी ते लेसर लाईट वापरुन फटाक्यांची आतषबाजी करतात.

धर्मांध : 😯😷

विवेकी : सर्वात महत्त्वाचे दिवाळी हा दिवा+रांगोळी याचा सण आहे. अरे दिवाळी तर आपण जोमाने साजरी करायचीच आहे, विरोध आहे तो अशास्त्रीय, अवैज्ञानिक परंपरांना… विनाकारण काही विचार न करता उठसूट जाळ काढत बसू नका… जरा थंड डोक्याने विचार करायला आपण केव्हा शिकणार?

☘️☘️

©  जगदीश काबरे

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ आषाढ तळावा, श्रावण भाजावा, भाद्रपद उकडावा… पण का ?? – लेखक : डॉ. शिवानंद बासरे ☆ सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

? इंद्रधनुष्य ?

आषाढ तळावा, श्रावण भाजावा, भाद्रपद उकडावा… पण का ?? – लेखक : डॉ. शिवानंद बासरे ☆ सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

पावसाळा एकच असला तरी, एकाच पावसाचे तीन रंग आणि त्यानुसार आहारातला नेमकेपणा, ही भारतीय परंपरेची परिपक्व देणगी. आषाढ महिन्यात तळलेलं, श्रावण महिन्यात भाजलेलं आणि भाद्रपद महिन्यात उकडलेलं खाणं म्हणजे तब्येतीबरोबरच पावसाळ्याचा यथेच्छ आनंद लुटणं ! पण असे खाणे कितपत सुरक्षित आहे ? असे खाणे म्हणजे नेमकं काय खाणे ?

आषाढ महिना म्हणजे पावसाळ्यातला सुरुवातीचा काळ. शरीराच्या आतून कोरडेपणा आणि बाहेरून गारवा अशा विचित्र परिस्थितीत सापडल्याने शरीर सर्वत्र आखडते. परिणामी सांधेदुखी, गुडघेदुखी, सर्दी, फडसे, थंडीताप अशा वाताच्या समस्या तीव्रतेने वाढतात. जमिनीखालची उष्णता व पहिला मुसळधार पाऊस, यामुळे एकाच वेळी शरीरात पित्त वाढते आणि वात अडकून बसतो. या दोन्हींना तंतोतंत बॅलन्स करायचं असेल तर “तळलेलं खाणं” हा अफलातून उपाय आहे. विशेषत: कोलेस्टेरॉल जराही वाढू न देता, तळलेले व गरम पदार्थ आषाढाच्या वातावरणात शरीराला गरम ठेवण्याचे काम अचूक करतात, शरीरात वंगन निर्माण करून मेडिकल इमर्जन्सी टाळायला मदत करतात. (हे केवळ आषाढ महिन्यातच घडते!). म्हणूनच, मे महिन्यात आपल्याकडे घरात पापड, कुरड्या, लोणची इ. आधीच बनवून ठेवायची पद्धत आहे. जेणेकरून पहिल्या पावसात हे पदार्थ तळून खाता येतील आणि पावसाचे आजार टाळता येतील. शिवाय; ओल्याचिंब पावसातली गरमागरम कांदा-भजी, चहा यासारखा इन्स्टंट रोमँटिक ‘आषाढ डायट’ जगात शोधूनही सापडणार नाही. !

श्रावण महिना म्हणजे पावसाळ्यातला दुसरा टप्पा. जमिनीतली उष्णता संपून चकाकी ऊन पडू लागते. ऊन-पावसाच्या खेळातून गारवा कमी होतो, मात्र दमटपणा वाढतो. परिणामी वात हळूहळू कमी होऊन शरीरावयावांचे आखडणे, दुखणे इ. तुलनेने कमी होते. मात्र पित्त वाढलेलेच असते. अशावेळी वाताचा फार विचार न करता, केवळ पित्ताला बॅलन्स करणे महत्त्वाचे, म्हणून “भाजलेलं खाणं” सर्वोत्तम आहे. उदा: तांदूळ भाजून केलेला भात, भाजलेली भाकरी, भाजलेल्या भुईमुगाच्या शेंगा, भाजलेला मका / वाटाणा, भाजलेले लाडू (शेंगदाणा / राजगिरा / रवा इ. ), भाजलेल्या वांग्याचे भरीत, भाजलेले पापड इत्यादी. असं खाल्ल्याने पित्त तर सुरळीत राहतेच, शिवाय अम्लपित्त, मायग्रेन, हाय-बिपी, मुळव्याध ह्या तक्रारी डोकेच वर काढत नाहीत. आणि हो, भाजलेलं खाण्याचा जो स्वर्गानुभव श्रावणात येतो, तो अख्या वर्षभरात कधीच येत नाही. कदाचित म्हणूनच आपल्याकडे “श्रावणमासी हर्ष मानसी. . . ” असे म्हंटले आहे !

भाद्रपद महिना म्हणजे पावसाळ्यातला शेवटचा आणि पावसाचा परतीचा टप्पा. गारव्याचा लवलेश संपल्याने वात बऱ्यापैकी शांत होतो. अधून-मधून पाऊस असूनही उकाडा मात्र प्रचंड असतो. यामुळे आधीच श्रावणात वाढलेले पित्त, शरीरात जिथे संधी मिळेल तिथे लगेचच अडकून बसते. परिणामी अचानक हार्ट अटॅक येणे, पॅरॅलिसिस झटका येणे, कोणताही आजार अचानक गंभीर होणे इ. गोष्टी भाद्रपद महिन्यातच घडू लागतात. म्हणूनच मृत्यू होण्याचे प्रमाण या महिन्यात अधिक असते. अनुचित घटना टळाव्यात म्हणून, भाद्रपद महिन्याच्या आसपास बहुतांश उपवास आलेले आहेत. जेणेकरून, कमी अन्न खाल्ले जाईल आणि पित्त अडकायला वावच भेटणार नाही. पित्त अडकून कुठलीही इमर्जन्सी येऊच नये, यासाठी “उकडलेलं खाणं” हा सर्वोत्तम उपाय आहे. जसे की; उकडलेला भात, उकडलेल्या शेंगा, उकडून शिजवलेल्या पालेभाज्या, उकडलेले मोदक, उकडलेली कंदमुळं इ. असं प्रयत्नपूर्वक केल्याने October Heat चे रूपांतर आपण October Hit नक्कीच करू शकू. कदाचित म्हणूनच, आपल्याला भेटण्यासाठी गणपती, गौरी, दुर्गा या सर्वांनी भाद्रपदाचा आसमंत मुद्दामच निवडला असेल… हो ना ?

लेखक : डॉ. शिवानंद बासरे

दीर्घायु हॉस्पिटल, नांदेड

 ९४२३२६७४९२

लेखक : श्री मंदार जोग 

माहिती संकलन : सौ. मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ गवळणींची प्रथा – –’ –  लेखक : श्री समीर गायकवाड ☆ संकलन व प्रस्तुती : डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘गवळणींची प्रथा – –‘ –  लेखक : श्री समीर गायकवाड ☆ संकलन व प्रस्तुती : डॉ. ज्योती गोडबोले 

गवळणींची प्रथा – – 

दिवाळीमध्ये अंगणात शेणापासून केल्या जाणाऱ्या ‘गवळणीं’ची प्रथा इतर अनेक प्रथांप्रमाणे हळूहळू लोप पावतेय. महाराष्ट्राच्या ग्रामजीवनाचं आणि गतकालीन ग्रामीण स्त्रियांचं भावविश्व उलगडणाऱ्या या गवळणी आता इतिहासजमा होत आहेत. आता तर दारात गायीगुरंच नसल्याने शेणही मिळत नाही आणि नव्या पिढीची मंडळी शेणात हात घालायला तयार होत नाही. यांमुळे लोकसंस्कृतीचा हा ऐतिहासिक ठेवा नष्ट होतोय, अर्थात काळाच्या प्रभावानुसार अशा गोष्टी घडत असतातच हेही मान्य केले पाहिजे!

दिवाळी हा कृषीजीवनावर आधारीत सण. गावांत शहरांत प्रत्येकजण आपापल्या ऐपतीप्रमाणे दिवाळी मोठ्या उत्साहाने साजरा करतो. दिवाळीच्या पाच दिवसांमध्ये कृषी संस्कृतीवर आधारीत विविध प्रथा आणि परंपरा साजऱ्या होतात. समृध्द लोकजीवनाचे दर्शन त्यातून घडतं. वेगवेगळ्या प्रांतात दिवाळी विविध पध्दतीने साजरी होते. त्यातून लोकजीवनाचं दर्शन प्रकर्षाने होते.

महाराष्ट्रात दिवाळीच्या आगळ्या प्रथा-परंपरा आहेत. त्यापैकीच एक म्हणजे दिवाळीच्या पाच दिवसांमध्ये अंगणामध्ये शेणापासून तयार केल्या जाणाऱ्या गवळणी. पूर्वी गावांमध्ये भरपूर गायीगुरं असायची. त्यांचे शेण मिळायचे. या शेणापासून धनत्रयोदशीच्या दिवशी पहिली गवळण तयार केली जायची. अर्थातच घरातील स्त्रिया या गवळणी बनवत. बाळगोपाळांचा उत्साह त्यावेळी ओसंडून वाही. प्रत्येक घरातील स्त्रिया मोठ्या कल्पकतेने या गवळणी बनवत. छोटे शेणगोळे बनवून आधी त्यांना बाहुल्यांचा आकार दिला जाई. सजावटीसाठी पाना-फुलांचा वापर करण्यात येई. कल्पनेतलं एक आटपाट नगरच या गवळणींच्या माध्यमातून उभे केलं जाई. पाच दिवस लोकजीवनातील वेगवगेळय़ा घडामोडी या गवळणींच्या माध्यमातून दाखविण्यात येत असत. पाचव्या दिवशी पांडव केले जात.

याकरिता अंगणाचा कोपरा राखून ठेवला जायचा. त्याला शेणाने सारवण्यात येई. त्याच्या मध्यभागी झोपलेला बळीराजा दाखविला जायचा. त्याच्या बाजूला काही गवळणी बळीराजाचे हात-पाय दाबताना दृष्टीस पडत. काही गवळणी स्वयंपाक करताना दाखविल्या जात. त्यासाठी सुंदर अशी चूलही मांडली जायची, त्यावर शेणाचेच तवे दाखवून भाकऱ्या करताना दाखवले जायचे. कुणी गवळणी दळणकांडण करताना दाखविल्या जायच्या. त्यासाठी शेणाचेच जाते केले जाई, जात्याच्या दोन्ही बाजूला बसून गवळणी धान्य दळत असल्याचे दाखविले जाई. शेणात बरबटलेली काडीपेटीची काडी म्हणजे जात्याचा दांडा असे!

काही गवळणी विहीरीवर पाणी भरण्यासाठी निघालेल्या दाखवल्या जात. एक हात कमरेवरच्या घागरीवर आणि दुसरा हात डोक्यावरल्या घागरीवर धरलेल्या या गवळणी सुंदर दिसत. काही गवळणी डोक्यावरील पाटीत भाजी घेऊन विकायला जात तर काहीजणी घरात देवपूजा मांडत, त्यासाठी शेणाचे देवघर करून त्यात नानाविध देव दाखविले जायचे. काही गवळणी गुरं राखायला पाळीवर घेऊन गेलेल्या दाखवत. तर काही गुरांना पाणी पाजताना दाखविल्या जायच्या. अंगणात खेळणाऱ्या गवळणी असत. डोंगर चढणाऱ्या, जेवण वाढणाऱ्या, ताक घुसळणाऱ्या अशा नाना प्रकारच्या गवळणी दाखविल्या जाता. कुणी लेकुरवाळी गवळण कमेरवर बाळाला घेऊन त्याला खेळवत असल्याचे दाखविले जाई. काही जणांना शेणाच्या टोप्या केल्या जात. क्वचित एखादीच गवळण पुस्तक वाचताना दाखवली जाई, अर्थातच त्या घरात शिक्षणाचं वारं दाखल झालेलं असे!

गवळणींना सजविण्यासाठी पाना-फुलांचा वापर केला जाई. कापसाच्या फुलांच्या, पानांच्या माळा गवळणींच्या गळ्यात घालत. गवळणींचा हा सारा संसार उभा झाला की त्या एकंदर नंदराज्याच्या बाहेरील बाजूला दोन बुरूज केले जात. त्यामध्ये चिपाडाची काडी घालून वेस बनविण्यात येई. गावाच्या वेशीवर तुतारी वाजविणारा शिंगाडा दाखविण्यात येई. जणू येणाऱ्या जाणाऱ्याचे तो शिंग वाजवून स्वागतच करतोय असे वाटे. त्यासाठी काचेची अर्धी बांगडी शिंग म्हणून त्या शेणाच्या बाहुलीत खुपसली जाई. वेशीजवळच दीपपाळ केली जाई. दीपमाळेवर पणत्या ठेवल्या जात. गावाकडच्या स्त्रीजीवनातल्या साऱ्या दैनंदिन घडामोडींचं सुंदर, सुबक भावदर्शन या गवळणींमधून व्हायचं.

पाच दिवस रोज वेगवेगळ्या प्रकारे गवळणी तयार करण्यात येतात. प्रत्येकजण आपापल्या कलाकौशल्याचं दर्शन शेणाच्या या गवळणी करताना घडवत असे. आपल्या गवळणी इतरांपेक्षा अधिक सुंदर आणि देखण्या कशा होतील याची जणू स्पर्धांच असायची. गवळणींच्या माध्यमातून उभारलेल्या आटपाटनगरात सगळं काही शेणाचंच असे. हे आटपाटनगर जरी स्त्रिया बनवत असल्या तरी, त्यातून लोकसंस्कृतीचं आणि ग्रामजीवनाचं यथार्थ दर्शन घडत असे. आपलं ग्रामजीवन किती समृध्द आणि स्वावलंबी होतं, याचं प्रत्ययकारी दर्शन ‘गवळणी’ बनविण्याच्या या प्रथेमधून व्हायचं.

पाचव्या दिवशी शेणाचे पाच पांडव केले जात. शेणाची मूद घेऊन त्याची द्रौपदी केली जायची. बळीराजा दाखवला जायचा. शेणाचा सुरेख असा डोंगर तयार केला जाई. कुणी चिपाडाच्या काटक्या एकत्र करून सुरेख मंडप करत. त्यावर आंब्याच्या डहाळया ठेवून मंडपाची शोभा वाढविली जाई. सलग पाच दिवसांत शेणापासून निर्मिलेल्या गवळणी जपून ठेवून छपरावर वाळवत घालण्यात येत. कार्तिक पौर्णिमेला त्यांचे दहन केले जाई. यावेळी कित्येक बारकाली पोरं धाय मोकलून रडत असत, मग त्यांच्या आयाबाया त्यांचे गालगुच्चे घेत त्यांची समजूत काढत असत! घरातली जाणती माणसं गालातल्या गालात हसत हे दृश्य मनात साठवत असत! 

आताशा हरेक घरापुढे गवळणी केल्या जात नाहीत. नव्या पिढीला त्यासाठीचं मार्गदर्शन करणाऱ्या सासूबाई, आजीबाईही आता लोप पावताहेत. तरीही काही अपवादात्मक ठिकाणी आपल्या आजी-आई, सासूकडून चालत आलेला वारसा जपण्याचा प्रयत्न काहीजणी करताना दिसतात. ज्या गावांचे शहरीकरण खूप कमी प्रमाणात झाले आहे अशा गावांमध्ये मात्र जुन्या पिढीतल्या वयस्क सागवानी बायका मात्र आजही शेणाच्या गवळणींची सुंदर रचना करून छोटसं आटपाटनगर वसवतात. आजीकडून नातीकडे आणि सासूकडून सुनेकडे चालत आलेला हा वारसा प्रयत्नपूर्वक पुढच्या पिढीकडे देण्यासाठी त्या इच्छुक दिसतात.

आता गुरं सांभाळणं हेच दिव्य होऊन बसलंय. जित्राबाऐवजी यांत्रिकी मदतीने शेतीकामे करण्याकडे कल आहे. यात गैर काहीच नाही. गावाकडच्या घरातले दूधदुभतेही घटत चाललेय. सारं काही अजस्त्र वेगाने बदलत चाललेय जे कुणीही रोखू शकत नाही. त्यामुळे काळाच्या ओघात अशा प्रथा नष्ट होतीलही परंतु पुढच्या पिढीच्या माहितीसाठी यांचं ‘डॉक्युमेंटेशन’ व्हायला हवं अन्यथा कधी काळी गावाकडच्या मायभगिनी, पोरंठोरं दर दिवाळीत शेणापासून सुंदर गवळणी बनवत असत नि त्याचाही आनंद घेत असत हे नव्या पिढीला खरं वाटणार नाही. जसजशी दिवाळी बदलत चाललीय तसतसे तिचे रुपडे प्राकृतिकतेपासून दूर जात अधिकाधिक कृत्रिम होतेय हे वास्तव आहे!

लेखक : श्री समीर गायकवाड

छायाचित्रे सौजन्य – सुश्री विनू कुलकर्णी

संकलक व प्रस्तुती : डॉ. ज्योती गोडबोले 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय १५ — पुरुषोत्तम योग — (श्लोक ११ ते २0) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय १५ — पुरुषोत्तम योग — (श्लोक ११ ते २0) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

संस्कृत श्लोक… 

यतन्तो योगिनश्चैनं पश्यन्त्यात्मन्यवस्थितम्‌ । 

यतन्तोऽप्यकृतात्मानो नैनं पश्यन्त्यचेतसः ॥ ११ ॥ 

*

 प्रयत्नान्ती जाणती योगी हृदयस्थ आत्म्याला

अज्ञानी परी यत्नाविन जाणू न शकती तयाला ॥११॥

*

 यदादित्यगतं तेजो जगद्भासयतेऽखिलम्‌ । 

यच्चन्द्रमसि यच्चाग्नौ तत्तेजो विद्धि मामकम्‌ ॥१२॥ 

*

 उजळुन टाकी समस्त जगता तेज भास्कराचे

चांदणे प्रकाशत रात्रीसमयी तेज शशांकाचे

जगी पसरेले दिव्य तेज जे पावक हुताशनीचे

मम तेज या सर्वांठायी अर्जुना गुह्य जाणायाचे ॥१२॥ 

*

 गामाविश्य च भूतानि धारयाम्यहमोजसा । 

पुष्णामि चौषधीः सर्वाः सोमो भूत्वा रसात्मकः ॥१३ ॥ 

*

 प्रवेश करुनी वसुंधरेत धारयतो मी सर्व जीवांना

रसस्वरूपी शशी होउनी पोषितो मी औषधींना ॥१३॥

*

 अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः ।

 प्राणापानसमायुक्तः पचाम्यन्नं चतुर्विधम्‌ ॥ १४ ॥ 

*

 सर्व जीवांच्या देहामध्ये मी वैश्वानर प्राणापान

चतुर्विध अन्नाचे देही करीतो मीच अंतर्ग्रहण ॥१४॥

*

 सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तः स्मृतिर्ज्ञानमपोहनं च । 

वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृद्वेदविदेव चाहम्‌ ॥१५ ॥ 

*

 समस्त जीवांच्या हृदयात मी अंतर्यामी स्थित

स्मृति-ज्ञानाचा कर्ता मीच माझ्यातुन उद्भवत

वेदांतील जाणावयाचे गुह्य मीच असे ते ज्ञान

वेदांचा कर्ता मीच मलाचि होई त्याची जाण ॥१५॥

*

 द्वाविमौ पुरुषौ लोके क्षरश्चाक्षर एव च । 

क्षरः सर्वाणि भूतानि कूटस्थोऽक्षर उच्यते ॥१६॥ 

*

 विश्वामध्ये क्षर-अक्षर दोन्ही पुरुष नांदती

नाशवंत काया जीवात्मा अविनाशी म्हणती ॥१६॥

*

 उत्तमः पुरुषस्त्वन्यः परमात्मेत्युदाहृतः । 

यो लोकत्रयमाविश्य बिभर्त्यव्यय ईश्वरः ॥१७॥ 

*

 भिन्न तथापि उत्तम पुरुष वास्तव्य तिही लोकी

धारतो पोषतो सकला ईश्वर परमात्मा अविनाशी॥ १७॥

*

यस्मात्क्षरमतीतोऽहमक्षरादपि चोत्तमः । 

अतोऽस्मि लोके वेदे च प्रथितः पुरुषोत्तमः ॥ १८ ॥ 

*

 मी सर्वस्वी अतीत नाश अस्तित्वापासून

उत्तम मीही अविनाशी जीवात्म्याहून 

आमुलाग्र जाण वेदांना श्रेष्ठत्वाची मम

तिही लोकांतुन दिगंत नाम माझे पुरुषोत्तम ॥१८॥

*

 यो मामेवमसम्मूढो जानाति पुरुषोत्तमम्‌ । 

स सर्वविद्भजति मां सर्वभावेन भारत ॥ १९ ॥ 

*

 ज्ञान जयाला झाले माझे पुरुषोत्तम अर्जुन 

भजतो मज वासुदेवा तो परमेश्वर जाणून ॥१९॥

*
 इति गुह्यतमं शास्त्रमिदमुक्तं मयानघ । 

एतद्‌बुद्ध्वा बुद्धिमान्स्यात्कृतकृत्यश्च भारत ॥२०॥ 

*
 जाणुन घेता तत्वतः ज्यासी कृतार्थ बुद्धिमान 

अतिगुह्य ज्ञान ते मी कथिले तुज पावना अर्जुन ॥२०॥

*

ॐ तत्सदिति श्रीमद्‌भगवद्‌गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे पुरुषोत्तमयोगो नाम पञ्चदशोऽध्यायः ॥ १५ ॥ 

*

 ॐ श्रीमद्भगवद्गीताउपनिषद तथा ब्रह्मविद्या योगशास्त्र विषयक श्रीकृष्णार्जुन संवादरूपी पुरुषोत्तमयोग नामे निशिकान्त भावानुवादित पञ्चदशोऽध्याय संपूर्ण ॥१५॥

 

मराठी भावानुवाद  © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ चामी मुर्मू… सादर नमन… — लेखिका : सुश्री राधा गर्दे ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

? इंद्रधनुष्य ?

☆ चामी मुर्मू… सादर नमन… — लेखिका : सुश्री राधा गर्दे ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे  ☆

चामी मुर्मू यांना पद्मश्री मिळताच झारखंड राज्य आनंदलं होतं. त्यांना पर्यावरणविद म्हणून पद्मश्री देण्यात आली होती.

खरंच, जर चामी मुर्मू यांचा जीवनप्रवास बघितला तर त्यांच्या अचाट अफाट कामांनी माणूस थक्कच होईल. …. फक्त इच्छाशक्तीच्या बळावर एक महिला काहीही करू शकते हे वाक्य चामी मुर्मू यांच्याकडे बघितल्यावर कळते. वृक्षारोपण, त्यांचं संवर्धन. जलसंरक्षण, महिला सशक्तीकरण या क्षेत्रात त्यांनी खूप कामगिरी केली आहे.

झारखंड येथील सरायकेला खरसांवाच्या बाघरासाई येथील चामी यांचं कुटुंब. आई, वडील, भाऊ, बहीण आणि आजोबा या सगळ्यांसोबत त्यांचा बाल्यकाल गेला. सगळे शेतभात बघणारे. अनेकदा दुसरीकडे मजूरीसाठी त्यांना जावं लागायचं पण तिथे पैसे मिळत नसून धान( सालासकट तांदूळ ) मिळत असायचं त्यामुळे परिस्थिती हलाखीची असायची.

चामी आपल्या आजोबांसोबत गावात होणाऱ्या बैठकीत जायच्या तिथे झाडा झुडपांची माहिती त्यांना मिळत असायची. कोणती झाडं चांगली असतात हे ही त्यांना कळायचे आणि तेव्हापासूनच त्यांना झाडं आणि पर्यावरण या विषयात आवड निर्माण झाली.

१९८८ मध्ये त्यांनी आपल्यासोबत अकरा महिलांना घेऊन बगराईसाई गावात बंजर जमीनीवर झाडं लावण्याचे काम सुरू केलं. त्यांनी झाडं लावलीच नाही, तर ती जगवली ही. त्यानंतर मात्र त्यांचा हा प्रवास उत्कृष्टरित्या सुरूच राहिला. … चामींनी आत्ता पर्यंत ७२० हेक्टेयर भागात ३० लाखांच्या जवळपास झाडं लावली आहेत.

आता प्रश्न हा उद्भवतो की त्यांना इतकी जागा मिळाली कुठून? कशी? तर त्या बाबतीत त्या सांगतात.

“आम्ही गावोगावी बैठकी घेतो. त्यात कोणाच्या जमीनीवर झाडं लावायची हे ठरतं. नंतर कोणती झाडं लावायची हे ठरवलं जातं. सगळ्यांच्या सहमतीने निर्णय घेऊन झाडं लावतो. तीन वर्षं आम्ही त्यांची निगा राखतो, नंतर ग्राम समीती बनवून ती झाडं त्यांच्या सुपुर्द करतो. अधूनमधून आम्ही ही लक्ष देतोच. ”

…. अशा प्रकारे ५०० गावांमध्ये ७२० हेक्टेयर भागात ३० लाखांच्या जवळपास झाडं लावली गेली.

हे काम करताना चामी यांना बऱ्याच अडचणी आल्या. एकदा १९९५/९६;साली त्यांच्या नर्सरीत लावलेली एक लाख रोपं एका रात्रीत जमीनदोस्त केली गेली. त्यांनी गावात सभा भरवली पण “ हे काम कोणी केलं” याचं उत्तर मिळालं नाही. त्यावर त्यांनी पोलीसांकडे तक्रार नोंदवली आणि गुन्हेगार धरले गेले. झाडं तोडून नेणाऱ्यांबद्दल ही त्यांनी पोलिसांना सांगून ते काम रोखलं होतं. लाकुड चोरणाऱ्या माफियांसोबत ही यांना बराच संघर्ष करावा लागला. त्यांना सतत धमक्या मिळत असायच्या पण त्यातून निष्कर्ष हा निघाला की आज सगळे माफिया, चामींना भिऊन असतात. नक्सल्यांशी ही दोन दोन हात करायला त्या घाबरल्या नाह तर त्यांच्या धमक्या ही बऱ्याच मिळाल्या पण हार मानली तर त्या चामी काय? या थाटात कामं करतच राहिल्या, आणि परिणामी “ लेडी टार्जन” या नावाने त्यांना ओळखलं जाऊ लागलं.

झाडं लावण्याची कामगिरी करत असतानाच, जलवायु परिवर्तनच्या समस्येकडेही चामींचं लक्ष वेधलं गेलं. त्यासाठी त्यांनी तलाव, छोटे तलाव, पावसाळ्यात वहाणाऱ्या नाल्या यांत पाणी साठवण्याचं काम सुरू केलं. त्यासाठी या सगळ्यांच्या मदतीने जिथे पाणी कमी मिळते त्या भागात पहाडी नाल्यां ठीक करत असतात, कधी कधी, कुठे कच्ची लहानगी धरणं बांधतात. पहाडांवरून पावसाचं पाणी खूप तीव्रतेने खाली येत असतं. पहाडांच्या बाजू बाजूने खड्डे पाडून त्या पाण्याची गती कमी करून हळूहळू खाली तलावात साठवलं जातं. अशातच ७१ गावात २१७ तलाव तयार केले गेले. चार अमृतसरोवर ही बांधले गेले. चामी सांगतात,

“ तलाव साधारणपणे १००× १००× १०चे असतात. जिथे पाणी पोहोचू शकते तिथेच आम्ही तलाव बांधतो. ”

आता त्या तलावात मत्स्य पालनाचे काम ही होऊ लागलंय.

चामींना सिंचनाचा विचार कसा काय आला असेल? तर त्यावर त्यांनी सांगितलं की ‘ आमच्या झारखंडमध्ये फक्त एकच पीक येत होतं. जर पाणी असेल तर दोनदा पीक येऊ शकतं ‘.. या विचाराने त्यांनी हे काम हातात घेतलं. त्याकाळात एक उद्घोष होता

“ हर हाथ को काम, हर खेत को पानी”

मग कामाबरोबरच पाण्याचं महत्त्व त्यांना समजलं. पाणी आलं असता या क्षेत्रातील पलायन थांबणं शक्य होतं.

१९९६, ते २०१८ या दरम्यान आलेल्या अहवालानुसार सरायकेला खरसावां या भागातील भूजल स्तर खूपच खाली गेला होता. त्याच अहवालात भूजलस्तर सुधारण्यासाठी तलाव वगैरे बांधण्याचे पारंपरिक सल्ले दिले गेले होते. तेच काम चामी मुर्मू यांनी हाती घेतलं आणि पूर्णत्वाला नेलं.

ही कामं करत असता चामींनी आणखी एक मोठी कामगिरी केली होती. ती म्हणजे “सहयोग महिला” म्हणून एन. जी. ओ. ची स्थापना. सुरुवात चार सहा महिलांपासून झाली. बायका सकाळ, संध्याकाळ स्वयंपाक करताना, एका मुठीत मावेल इतकी धान बाजूला काढून ठेवायच्या. आठवड्याच्या शेवटी त्यांचे तांदूळ करून ते बाजारात विकून पैसे मिळवायच्या. हळूहळू हा समूह एक स्वयं सहायता समूह झाला आणि मग “सहयोग महिला”. नंतर हा समूह बैंकैशी जोडला गेला.

दलमाच्या घाटीत दूर रहाणाऱ्या आदिम पहाडी जनजातीच्या मुलींच्या शिक्षणासाठीही चामींनी धडपड केली. गावाच्या ऑफिसमध्ये मुलींना पाचवीपर्यंत शिक्षण दिल्यानंतर त्यांना कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय येथे एडमिशन मिळवून दिलं जातं. ही संघटना सुरक्षित प्रसव, एनिमिया या समस्यांकडे ही लक्ष देऊन महिलांचे जीवन सुखद करते. महिलांना रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असताना बैंकेकडून अनेक योजनांसाठी मिळणाऱ्या कर्जाने त्यांनी हजारो हातांना कामं दिली.

मदर टेरेसाला रोल मॉडेल मानणाऱ्या चामींनी २६३ गावात २८७३ सहायता समूह स्थापित केले ज्यात ३३, ००० सभासद आहेत.

ही सगळी कामगिरी करणाऱ्या चामी मुर्मूंना सोशल मीडिया ट्विटर वर “ आदिवासी योद्धा ” ही पदवी दिली गेली. इतकी अफाट कामगिरी करणाऱ्या चामी मुर्मू नक्कीच पद्मश्री मिळवण्याच्या योग्यच आहेत.

पर्यावरण आमची जवाबदारी आहे. प्रत्येक नागरिकाने त्याविषयी विचार करायलाच हवा आणि त्याचं जतन ही करायला‌ हवं. त्यांचं एक म्हणणं आपण लक्षात ठेवून थोडा हातभार लावून महिला शक्तीला सादर नमन करूया.

लेखिका : सुश्री राधा गर्दे, कोल्हापूर

प्रस्तुती : सुश्री प्रभा हर्षे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ द्वारकेतील श्रीकृष्ण मंदिराची भव्य ध्वजा ☆ माहिती संकलन व प्रस्तुती – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी

? इंद्रधनुष्य ?

☆ द्वारकेतील श्रीकृष्ण मंदिराची भव्य ध्वजा ☆ माहिती संकलन व प्रस्तुती – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

आपल्या देशातील अनेक मंदिरांची वेगळी वैशिष्ट्ये आहेत. पुरी येथील जगन्नाथ मंदिर असो किंवा तिरुपतीचे व्यंकटेश मंदिर असो, तेथील शेकडो वर्षांपासून असलेली ही वेगळी वैशिष्ट्ये आजही लोकांना थक्क करीत असतात. गुजरातमधील द्वारका येथील भगवान द्वारकाधीश श्रीकृष्णाच्या मंदिराचीही अशी अनेक वैशिष्ट्ये आहेत. त्यामध्ये या मंदिराच्या शिखरावर असलेल्या ध्वजेचाही समावेश आहे.

देशातील सप्त मोक्षपुरींमध्ये द्वारकेचा समावेश होतो. मथुरेवर जरासंधाचे वारंवार आक्रमण होत असल्याने भगवान श्रीकृष्णांनी सौराष्ट्रात समुद्राला मागे हटवून द्वारकानगर वसवले होते. श्रीकृष्णाच्या निधनानंतर आठ दिवसांनी समुद्राने ही द्वारका पुन्हा गिळंकृत केली. सध्याची द्वारका ही बुडालेल्या द्वारकेनंतर वसवलेली नवी नगरी आहे. तेथे अतिशय प्राचीन काळापासून भगवान द्वारकाधीशाचे भव्य मंदिर आहे. हे मंदिर पाच मजली असून ७२ खांबावर उभे आहे. मंदिराचे शिखर ७८. ३मीटर उंचीचे असून त्यावर सुमारे ८४ फूट लांबीची धर्मध्वजा फडकत असते. असेही म्हंटले जाते की ही ध्वजा ५२ गजांची आहे. या ध्वजेवर सूर्य आणि चंद्राच्या प्रतिमा आहेत. त्याचा अर्थ जोपर्यंत सूर्य चंद्र असतील तर तोपर्यंत भगवान द्वारकाधीशांचे नाव कायम राहील. ही ध्वजा इतकी मोठी आहे की ती दहा किलोमीटर वरूनही दिसते. दुर्बिणीतून पाहिल्यावर तिच्यावरील चिन्हेही दिसून येतात. ही ध्वजा नेहमी पश्चिमेकडून पूर्वेकडे फडकत असते. वाऱ्याची दिशा कोणतीही असली तरी ही ध्वजा पूर्व दिशेकडेच फडकत असते. हे भारतातील एकमेव असे मंदिर आहे जिथे दिवसांतून तीन वेळा म्हणजेच सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी ५२ गजाच्या ध्वजेचे आरोहण केले जाते. ही ध्वजा भाविकांनी अर्पण केलेली असते. आणि या भाविकांना आपला क्रमांक येण्यासाठी दोन दोन वर्षे वाट पहावी लागते. ध्वजा बदलण्याचा विधी हा एक खास कार्यक्रमच असतो. ही ध्वजा एक विशिष्ट शिंपीच शिवून देतो. ही ध्वजा उतरवणे – चढवणे हे कामही विशिष्ट लोकच करतात.

माहिती संकलन व प्रस्तुती :  सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी

कोल्हापूर

7387678883

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ पत्रदुर्गा नीलाताई – लेखक श्री आनंद देवधर ☆ प्रस्तुती – श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

? इंद्रधनुष्य ?

☆ पत्रदुर्गा नीलाताई – लेखक श्री आनंद देवधर ☆ प्रस्तुती – श्री आशिष बिवलकर ☆

नीलाताई उपाध्ये यांच्या निधनाची बातमी आज सकाळी समजली आणि मन आपोआपच भूतकाळात शिरले. महिला पत्रकारितेतील एक पर्व संपले.

माझे वडील वि ना उर्फ विसुभाऊ देवधर महाराष्ट्र टाइम्समध्ये असताना नीला पाटील त्यांच्या सहकारी होत्या. नीला पाटील म्हणजे शेकापचे ज्येष्ठ नेते दत्ता पाटील यांची भाची. तरुण भारतचे वसंतराव उपाध्ये यांच्याशी लग्न झाल्यानंतर त्या नीला उपाध्ये झाल्या आणि त्याच नावाने प्रसिद्ध झाल्या 

मुंबईच्या पत्रकारितेच्या इतिहासातील पहिल्या पिढीतील दोन गाजलेल्या महिला पत्रकार म्हणजे इंग्रजी पत्रकारितेतील ओल्गा टेलीस आणि मराठीतील नीला उपाध्ये. मराठी पत्रकारितेतील आपले करिअर त्यांनी महाराष्ट्र टाइम्समध्ये व्यतीत केले.

ज्या काळात पत्रकारिता ही Male dominated होती. वार्ताहर हे पुरुष असत. त्या काळात नीलाताईंनी ते वर्तुळ भेदले. माझ्या माहितीप्रमाणे रात्रपाळीच्या वार्ताहर म्हणून काम करणाऱ्या त्या पहिल्या महिला पत्रकार होत्या. राजकीय पत्रकारिता करता करता साहित्य, कला, चित्रपट आदी क्षेत्रांमध्ये त्यांनी मुशाफिरी केली, विपुल लेखन केले आणि महाराष्ट्र टाइम्सच्या वाचकांना भरभरून खाद्य पुरवले. प्रेमळ परंतु कडक शिस्तीच्या नीलाताई निर्भीड होत्या. सडेतोड बोलत परंतु प्रेमळ होत्या.

“बाळशास्त्री जांभेकर- काळ आणि कर्तृत्त्व ” हे आज दुर्दैवाने आऊट ऑफ प्रिंट असलेले पुस्तक, त्यांचे वरिष्ठ सहकारी दि वि गोखले यांच्यावर लिहिलेले “पत्रकार दि. वि. गोखले व्यक्तित्त्व आणि कर्तृत्व” हे चरित्रात्मक पुस्तक आणि प्रतिभावांत कवयित्री शांताबाई शेळके यांच्यावर “शब्दवती शांताबाई” ही त्यांनी लिहिलेली काही पुस्तके.

मराठी तरुण तरुणींना पत्रकारितेचे धडे देण्याचे नीलाताईंनी केलेले कार्य हिमालयाएवढे आहे. गरवारे व्यवसाय विकास संस्थेसाठी त्यांनी अमाप कष्ट घेतले आणि पत्रकारांच्या दोन पिढ्या निर्माण केल्या. कोकण मराठी साहित्य परिषदेसाठीही त्यांनी उत्तम कार्य केले.

दोन व्यक्तिगत आठवणी सांगायच्या मोह अनावर होत आहे. सत्तरीच्या दशकाच्या मध्यावर (आता नेमके वर्ष आठवत नाही) मुंबई मराठी पत्रकार संघाची निवडणूक होती. त्या वर्षी माझे वडील खजिनदार म्हणून निवडून आले होते. दादांबरोबर मी संध्याकाळी आझाद मैदान येथील मुंबई मराठी पत्रकार संघात गेलो होतो नीलाताईंनी दादांचे अभिनंदन केले. त्यावेळी कोणीतरी निवडणूक हरले असा उल्लेख आला. त्यावेळी मी दादांना विचारले की “त्यांचे डिपॉझिट जप्त झाले असेल ना?” माझ्या त्या प्रश्नावर नीलाताई खळखळून हसल्या, माझा गालगुच्चा घेतला आणि दादांना म्हणाल्या “विसूभाऊ तुमचा मुलगा चुणचुणीत आहे. ” माझे वय जेमतेम १२-१३ असावे.

सुरुवातीला त्या सायनजवळ प्रतीक्षानगर येथे राहत असत. आम्ही तिघे भाऊ नॉनव्हेज खात होतो. एक दिवस त्यांनी आम्हाला त्यांच्या घरी खास आगरी पद्धतीचे मासे खायला बोलवले होते. माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच मी घरी बनवलेले मासे खाल्ले. कोणतीही गोष्ट जेंव्हा आपण पहिल्यांदा करतो आणि ती आवडते तेंव्हा ती विसरता येत नाही. नीलाताईंच्या हातची “तुकडी” मी कधीही विसरू शकत नाही.

नवरात्राच्या निमित्ताने स्त्री शक्तीचा जागर सुरू असतानाच पत्रदुर्गा नीलाताई उपाध्ये यांच्या निधनाची बातमी यावी हा केवढा मोठा दैवदुर्विलास.

नीलाताईंच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

लेखक : आनंद देवघर 

प्रस्तुती : श्री आशिष बिवलकर 

बदलापूर – मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “पनीर रोटी !” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

 

? इंद्रधनुष्य ?

पनीर रोटी !! ☆ श्री संभाजी बबन गायके 

“भाईसाब, मुझे थोडा बाथरूम तक लेके जायेंगे?”

पिंपरी चिंचवड येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील मेल सर्जीकल वॉर्ड मधील एका बेडवरून एका आवाजाने माझे लक्ष वेधून घेतलं! वयाच्या सुमारे पन्नाशीत असलेला एक गृहस्थ बेडवरून उठण्याचा प्रयत्न करीत होता. त्याच्या सोबत कुणी नव्हतं. त्याच्या डोक्यावरची पगडी तशी सैल पडली होती. अंगावरच्या शर्टची वरची बटणे तुटलेली, पँट गुडघ्यावर फाटलेली होती. एका हाताच्या मनगटावर स्टीलचं कडं होतं, त्याच्या वरच्या भागावर खरचटल्याच्या जखमा होत्या अगदी ताज्या. कोणत्याही शीख बांधवास साजेशी भक्कम देहयष्टी, पण डोळ्यांत खूप आर्जव आणि आवाजात कंप.

मी त्याला धरून स्वच्छतागृहापर्यंत नेले. . . “शर्माईगा नहीं!” मी त्याला सांगितले, त्याने माझ्याकडे भरल्या डोळ्यांनी एकदा पाहिलं. त्याला तिथून परत आणताना त्याच्या चेहऱ्यावर अगतिकतेचे भाव दाटून आले होते!

नाव विचारलं. . अडखळत उत्तर आलं. . “जी, गुरमित. . . गुरमित सिंग!”

सकाळी एका टेंपोवाल्याने त्याला वायसीएम मध्ये आणून इमर्जंसी मध्ये भरती केलं होतं. . . आणि तो भला माणूस निघून गेला होता.

गुरमितचं जवळचं असं कुणी नव्हतं इथं. पुण्याजवळच्या एका औद्योगिक वसाहतीत पोटासाठी कमवायला गुरमित आला होता, काही वर्षांपूर्वी. मराठी समजत होतं, पण बोलता येत नव्हतं. कारखान्यातील काम अंदाजे शिकला आणि आता सीएनसी मशीन व्यवस्थित ऑपरेट करू शकत होता. पंजाबातील एका शहरात जन्मलेल्या या साध्या शेतमजूर माणसाचं लग्न झालेलं होतं, पण पत्नी अकाली निवर्तली होती आणि मूल झालेलं नव्हतं. . . पुन्हा लग्न करायचं त्याच्या मनात कधी आलं नाही. पोटासाठी दिल्ली गाठली, भावाला बोलावून घेतलं, त्याला रोजगाराला लावून दिलं, उपनगरातल्या एका गरिबांच्या वस्तीत जागा मिळवून घर बांधून दिलं पण भावजय आली आणि याला दिल्ली सोडावी लागली. कारण गुरमित आजारी झाला. . . एका वाहनाने धडक दिल्याने पायात रॉड टाकला होता. . . त्याने सगळं आपलं आपण केलं. भावाला उपद्रव नको म्हणून खरडत, रखडत दूर मैदानात शरीरधर्मासाठी जाई. कमाई थांबली होती पण खाण्या पिण्याचे नखरे अजिबात नव्हते. बरे झाल्यावर मजुरीला जाण्याची वाट पाहत होताच. . . पण भावाला जड झाला थोड्याच दिवसांत.

आयुष्याला काही दिशा नव्हती. भावाच्या संसारात मन गुंतवत आयुष्य काढायचं मनात होतं. . आईबाप आधीच देवाघरी गेले होते. गावची शेती अगदी नगण्य. एका ट्रकमध्ये क्लिनर बनून पुण्यात आला. आरंभी मिळेल ते काम केलं आणि नंतर उपनगरात कुणाच्या तरी ओळखीने कारखान्यात हेल्पर झाला. कारखान्यात इतर राज्यातून मजुरीसाठी आलेल्या कामगार मुलांसोबत नाईलाजाने राहावे लागले छोट्या भाड्याच्या खोलीत. हा शीख, ते इतर कुणी. याचा स्वभाव तसा अबोल. व्यसन नाही त्यामुळे कुणाशी देणे घेणे व्यवहार नाही.

कोरोना आला आणि खोली रिकामी झाली. . . गुरमित कुठे जाणार? कारखान्याच्या शेड मध्येच मुक्काम आणि काम. नंतर जवळ एक खोली भाड्याने मिळाली. पैसे शिल्लक पडलेले होते थोडे. अडीअडचणीमध्ये उपयोगी पडावेत म्हणून बँकेत जपून ठेवले होते.

गुरमित टायफॉइडने आजारी झाला. असाच एका संध्याकाळी गोळ्या औषधं आणायला म्हणून गावात निघाला होता. . . रस्त्यावरच्या दगडाला पाय अडखळून पडला. . . तो नेमका उताणा. कमरेला मार बसला आणि त्याचं अंग, विशेषतः संपूर्ण उजवा भाग बधिर झाला आणि सतत थरथरू लागला!

आज गुरमित थरथरत्या देहाने बेडवर पडून होता. रुग्णालयातील सेवाभावी संस्थेच्या लोकांनी गुरमितला मदतीचा हात दिला. त्यावेळी ycm मध्ये सहा बेवारस रुग्ण होते!

संस्थेने गुरमित ची जेवणाची व्यवस्था केली, जेवणाचे पार्सल आणून ठेवले. गुरमितची अवस्था तशी बरी वाटत नव्हती. विविध तपासण्या झाल्या. . रिपोर्ट यायचे होते.

गुरमितने डाव्या हाताने जेवणाच्या प्लास्टिक पिशवीची गाठ कशीबशी सोडवली, भाजी प्लेटमध्ये ओतली. . . उजवा हात आणि आता पायही थरथरू लागले होते. कसाबसा एक घास त्याने तोंडपर्यंत नेला. . . पण त्याला वेळ लागत होता. मी त्याच्या पोळीचा एक तुकडा तोडला, भाजीत बुडविला आणि त्याच्या मुखात घातला. . . . त्याने माझ्याकडे पाहिले. . . “मैं खा लूंगा प्राजी!” तो म्हणाला. . . मी म्हणालो” रहने दो. . . आराम से खाना”

 आणखी तीन घास तोंडात घातल्यावर मात्र त्याने मला थांबायला सांगितले. . . संकोच होत होता त्याला. . . एवढा मोठा माणूस लहान मुलासारखा दुसऱ्याच्या हातून जेवतो आहे. . . त्याला कसं तरी वाटत असावं!

वॉर्डातील इतर रुग्णांचे नातेवाईक आणि नर्स आणि वॉर्डबॉय, मामा सुद्धा गुरमितला पाहून हळहळत होते! 

दुपारी गुरमित सीरियस झाला! त्याला श्वास घेता येईना! डॉक्टरांनी धावपळ करून त्याला ऑक्सीजन लावला तिथेच. आय सी यू मध्ये बेड उपलब्ध नव्हता त्यावेळी. मग सर्व यंत्रे तिथेच आणून लावली. गुरमित घामाघूम झाला होता. . . . चार तास त्याने दम काढला. . . “लकवा मार गया क्या मुझे?” तो विचारू लागला. एकटा माणूस, अर्धांगवायू म्हणजे काय ते त्याला ठाऊक होते. . . आयुष्यभर परावलंबित्व! 

मी त्याचा मोबाईल मागितला. . त्यात अगदी मोजकेच नंबर. छोटू म्हणून एक नंबर सेव्ह होता. . . “वो हमारे लिये मर गया”. . . . त्या भावाने मला उत्तर दिले. . फोन बंद!

एका सेवाभावी संस्थेविषयी गुरमितला वरवर माहिती होती, त्याने सांगितलेल्या गोष्टींवरून मी इंटरनेटवर अंदाजे शोध घेतला. दिल्लीतील एका संस्थेचे नाव, फोटो दिसले. गुरमितने त्या व्यक्तीला ओळखले. . . “उनसे बात करावो”. . . त्याने विनंती केली! पुढे पंजाबी भाषेत झालेल्या संवादात एवढेच समजले की. . ती संस्था फक्त रस्त्यावर बेवारस सापडलेल्या मानसिक रुग्णांवर मोफत उपचार करते!

“ऐसी हालत में जी के मैं क्या करुंगा?” गुरमित त्यांना विचारत राहिला. “प्राजी. . . . मेरी कुछ मदद करो. . बडी मेहरबानी होग्गी”. . . पण पलीकडून सोरी जी. . . एवढंच ऐकू आलं. “आप पुना में ही किसी से बात करो!”

काहीवेळाने गुरमित ची अवस्था आणखी बिघडली. पण तेवढ्यात आय सी यू मध्ये एक बेड उपलब्ध झाला. . . सर्वांनी मिळून गुरमितला स्ट्रेचरवर चढवले आणि त्या वॉर्ड मध्ये नेले!

थोड्यावेळाने समजले. . . सरदारजी सीरियस झाला आणखी. अंतर्गत रक्तस्राव झालाय. . . अवघड आहे! वॉर्डातील लोक हे ऐकून चुकचुकले!

आय सी यू मधील अत्यवस्थ रुग्णांच्या नातेवाईकांची धावपळ गुरमित पहात होता. . . त्याला त्याचा एकाकीपणा अधिकच टोचू लागला असावा. . . रुग्णाची जगण्याची इच्छा संपली की औषधे उपयोगाची नसतात!

रात्री गुरमित गेला! अशी अफवा पसरली. . . पण लगेच विरून गेली! कोणतेही रक्ताचे नाते नसलेले लोक क्षणभर मनातून हलले होते. . . सिस्टर आणि कर्मचारी त्यांना अशा बाबींची सवय असली तरी त्यांचे चेहरे बदलून गेले होते. . . . पण सरदार अभी जिंदा है! अशी पक्की बातमी आली आणि सर्वांनी दीर्घ निःश्वास टाकले. . . चला, या मरणाच्या खोट्या बातमीने बिचाऱ्याचे आयुष्य वाढू दे. . . एका मावशींनी देवाला हात जोडून म्हटले!

तीन आठवडे झाले. . . आज अचानक गुरमित जनरल वॉर्ड मध्ये पाय मोकळे करण्यासाठी हळूहळू फिरताना दिसला! अर्धांगवायूने त्याला बरीच सवलत दिली होती. . . उजवा हात  अजुनही काहीसा बधीर होता, नीट चालता येत नव्हते. . . पण चालता येत होते हे महत्वाचे!   डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्ड बॉईज, मामा, मावश्या सगळे या तगड्या पण निरागस माणसाला काही कमी पडू देत नव्हते!

गुरमितने मला पाहिले आणि त्याचा चेहरा उजळला. . . त्याने नुकतेच त्याचे लांब केस धुतले होते आणि तो पगडी बांधण्याच्या तयारीत होता! त्याने मला मिठी मारली!

“कुछ खावोगे?” मी विचारले. दुपारच्या जेवणाची वेळ झालीच होती. ” नहीं, भाईसाब! खाना आताही होगा! ” तो संकोचून म्हणाला!

“पनीर रोटी?” मी म्हणालो तसे त्याच्या चेहऱ्यावर हास्य उमटले. . . गावाकडे असताना आईच्या हातची रोटी त्याला आठवली असावी. . . ट्रक वर असताना ढाब्यावर बाजेवर बसून खाल्लेली पनीर रोटी, दाल तडका त्याला नजरेसमोर दिसला असावा!

“पंजाबी हो. . . पनीर रोटी बिना खाना फिका फिका लगा होगा पिछले महिनाभर!”

मी पार्सलची पिशवी त्याच्या हातात दिली. . . . गुरमित ने माझा हात हाती घेतला. . . . आणि त्याच्या चेहऱ्यावर मला सारा पंजाब हसताना दिसला!

मी म्हणालो. . . सत् श्री अकाल. . . गुरमित म्हणाला. . जय महाराष्ट्र!

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares