मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मन शुद्ध तुझं ! – भाग-१ ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

मन शुद्ध तुझं ! – भाग-१ ☆ श्री संभाजी बबन गायके 

… गोष्ट एका विशालहृदयी सैनिकाची ! 

नियतीने स्वर्गात बांधलेली त्यांची लग्नगाठ आता सैल होईल आणि सुटून जाईल, असं सर्वांनाच वाटलं होतं. किंबहुना त्याच्या काळजीपोटी त्याच्या आप्तांनी, मित्रांनी त्याला ‘ ही गाठ सोडवून घे ‘ असा सल्लाही दिला होता… जगाला व्यवहार जास्त प्रिय असतो आणि त्यात चुकीचंही काही नाही म्हणा ! 

पण हा पडला शिपाईगडी… शब्दाचा पक्का… इमान राखणारा! देशासाठी तळहातावर शीर घेऊन मरणाला सामोरं जाण्याची खरीखुरी तयारी ठेवणारा जवान ! 

लढाई सीमेवरची असो किंवा जीवनातली… दोन्ही आघाड्यांवर निष्ठा महत्त्वाची! प्रेमात आणि युद्धात सर्वकाही क्षम्य असतं असं म्हटलं जात असलं तरी त्याला प्रेमात कोणताही अपराध करायचा नव्हता !

त्याला ती अशीच योगायोगाने भेटली होती… सुंदर, सालस आणि मनमोकळी. पहिल्याच भेटीत त्यानं तिला आपलं काळीज बहाल केलं…. महिलांशी अत्यंत सुसंस्कृतपणे वागणारा रुबाबदार व्यक्तिमत्वाचा तो तिला भावला नसता तरच नवल! तिने त्याच्या हातात निर्धास्तपणे आपला हात दिला…. आणि ते दोघं आता एक झाले… प्रेमाच्या आणाभाका झाल्याच आणि या प्रेमाच्या या अलंकाराला  व्यवहाराचं, समाजमान्यतेचं साखरपुड्याच्या गोडीचं कोंदणही लगोलग लाभलं… सीमेवरील कर्तव्ये बजावताना थोडेशी उसंत काढावी आणि लग्नबंधनात स्वत:ला बांधून घ्यावं, असं ठरलं ! 

मोहरलेल्या मनाची ती, आनंदाच्या वाटेवर अलगद चालत निघालेली.. पण कसा कुणास ठाऊक, त्या पावलांमध्ये शारीरविकाराचा काटा शिरला… विव्हल होऊन गेली ती. चालणारी पावलं आता कुणाच्यातरी आधाराची मिंधी झाली. कशी चालणार सप्तपदी? लोक म्हणाले… ‘ थांबव तुझा हा प्रवास. त्यालाही मोकळं कर या तुझ्यासोबतच्या प्रवासातून… त्याला त्याची एखादी वाट खुणावेलच कधी ना कधी तरी !’

तिलाही हे पटलं… आणि त्याला काही इलाजही नव्हताच की ! लग्न म्हणजे शरीराचा व्यवहार…. यात एक व्यंग आणि एक अव्यंग अशी जोडी विजोड. त्याच्या कानांवर सुद्धा हा आघातच होता… पण असे आघात पचविण्याची सवय असते सैनिकाच्या मनाला. तो म्हणाला… “आमचं लग्न झालं असतं आणि मी लढाईत माझे पाय गमावले असते तर तिने मला सोडले नसते… माझी खात्री आहे !”

तो सीमेवरून थेट आला आणि विवाहवेदीवर चढला.. ती विकल… असहाय… तो तिचे पाय झाला…. एकट्यानं अग्निप्रदक्षिणा केल्या… एक पाऊल त्याचे आणि एक तिचे. सातव्या पावलावर वधूने वराला वचन द्यायचे असते.. ‘मी तुझ्याशी माझे मैत्र अविनाशी ठेवीन… काहीही झाले तरी… आता आपली पावले जोडीने जीवनाच्या वाटेवर सुखाने मार्गाक्रमण करीत जातील !’ 

तिची पावले आता तर जमीनीला स्पर्शूही शकणार नव्हती…. पण तो म्हणाला… ‘ मी चालेन तुला कवेत घेऊन !’ आणि देव, ब्राम्हण, सगे-सोयरे यांच्या साक्षीने तिचा पत्नी म्हणून स्विकार केला….. आता चार पावलांचा प्रवास दोन पावलं करू लागली होती. दिवस फुलपाखरांची सोंगं घेऊन येतात… नकळत उडूनही जातात. 

आठ महिन्यांत तिच्या शारीरविकाराने उसळी घेतली आणि निम्म्या देहाची आणि संवेदनांची ओळख कायमची पुसली गेली. हे तर निम्मं जगणं… अर्धाच श्वास घेणं जणू! पण तो तसूभरही डळमळला नाही! आता तिचे श्वासही तोच घेऊ लागला आणि तिच्या उरलेल्या देहात चैतन्य भरू लागला. 

तो कुठंही एकटा जात नसे… ती सोबत पाहिजेच. त्याचा तसा आग्रहही असायचा. ती संकोचून जायची. त्याने तिची भीड चेपवली. लग्नसमारंभ, मेजवान्या, हॉटेल्स, भेटी-गाठी या सर्वांत तो तिला चाकांच्या खुर्चीतून न्यायचा… आणि वेळप्रसंगी तिचा भारही वहायचा… प्रेमानं ! बघणारे स्तिमित होऊन जायचे.. आणि तिचा हेवाही करायचे ! 

रंगरूप, तारूण्य, विचार, भावना आणि आर्थिक, सामाजिक स्थान यांच्यात तफावत पडत गेल्यावर एकमेकांपासून दुरावणारी, प्रसंगी खुशाल अनैतिकतेच्या मार्गाने जाणारी दांम्पत्ये पाहण्याची सवय झालेला समाज…. त्याला आश्चर्य होणारच! पण भारतीय सैन्यामध्ये महिलांचा सन्मान राखण्याची, जपण्याची शिकवण ही अंगभूत. सहकारी, अधिकारी त्याच्या  ह्या दिलदारपणावर बेहद्द फिदा होते.

युद्धात पाय गमावलेला एखादा सैनिक जेंव्हा चाकांच्या खुर्चीवर बसलेला असतो, तेव्हा त्याच्या खुर्चीमागे त्याची पत्नी चालत असलेली पाहण्याचा अनुभव असलेले डोळे हे दृश्य बघून विस्फारले जायचे… आणि त्याच्याकडे मोठ्या आदराने बघत रहायचे…. तिला संकोचून जायला होऊ नये अशा बेताने… आणि ती सुद्धा आता सरावली होती ! 

दिवस म्हणजे पाखरं… उडून जाण्यासाठी खाली उतरलेली. तो सीमेवर गेला आणि कर्तव्यात गुंतला… आता त्याची दोन मनं होती… एक कामात आणि एक तिच्या आठवणींमध्ये रमलेलं. 

तो असाच सुट्टीवर आला आणि त्याने तिला मनसोक्त हिंडवून-फिरवून आणलं! आणि त्याची सीमेवर जायची वेळ आली नेहमीप्रमाणे, आणि निघाला सुद्धा ! 

त्याला आता संघर्षरत सीमेवर कर्तव्यासाठी नेमलं गेलं होतं… ती मनातून घाबरली… तो म्हणाला होता ‘मी परत येईन! आधी नव्हतो का परतलो…. उंच पर्वतशिखरांवरून, मृत्यू भरलेल्या जंगलांतून आणि प्रत्यक्ष सीमेवरूनही? आपल्या घराजवळच नव्हती का काही महिने पोस्टींग मिळाली मला? तेंव्हा होतोच की सोबत! आता सीमांनी पुन्हा एकदा बोलावणं धा   डलं आहे… जायला पाहिजे… राणी!’

आणि मेजर शशीधरन साहेब सीमेवर रुजू झाले. शत्रूने रस्त्यात सुरुंग पेरून ठेवलेले होते… त्यात आधीच आपले काही जवान जखमी झाले होते. अतिरेक्यांचा शोध घेऊन त्यांना ठार मारणं अनिवार्य होतंच. ही कामगिरी करण्यासाठी निघालेल्या गोरखा रायफल्सच्या पथकाचे नायक होते… मेजर शशीधरन नायर!… सर्वांच्या पुढे चालत होते. कामगिरीवर निघण्याआधी थोड्याच वेळापूर्वी फोनवरून आईशी बोलणं झालं होतं…! 

– क्रमशः भाग पहिला 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ वि. स. खांडेकर स्मृतिदिनानिमित्त – आठवणींची सांजवात… भाग-२ ☆ श्री कचरू चांभारे ☆

श्री कचरू चांभारे

? इंद्रधनुष्य ?

☆ वि. स. खांडेकर स्मृतिदिनानिमित्त – आठवणींची सांजवात… भाग-२ ☆ श्री कचरू चांभारे ☆

भाऊ माझे अतिशय आवडते लेखक आहेत. आज त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांनी लिहिलेल्या सांजवात या कथासंग्रहाचा परिचय करून देत आहे. भाऊंचे लेखन म्हणजे जीवनाचा वास्तववाद. लेखन हे काल्पनिक असले तरी ते वाचताना, हे कथानक भोवताली घडले आहे असे वाटत राहते.

सांजवात: लेखक वि.स.खांडेकर 

प्रथम आवृत्ती 1948 

प्रकाशक.. मेहता पब्लिशिंग हाऊस पुणे 

या कथासंग्रहात एकूण सात कथा आहेत.

1.तीन जगे 

2.शिखर 

 3.दोन मोसंबी 

4.शांती 

5.सोन्याची गाडी 

6.दोन भुते 

7.सांजवात 

यापैकी शांती, शिखर व दोन भूते या तीन रूपक कथा आहेत. 

तीन जगे : … 

समाजातील तीन वर्ग म्हणजे खांडेकरांनी मांडलेली ‘ तीन जगे ‘ ही कथा होय. श्रीमंत वर्ग ,कनिष्ठ वर्ग व मध्यमवर्ग असे तीन वेगवेगळे विश्व आहेत. आजही या तीन वर्गात फार मोठी तफावत आहे. ती पुढे कधी भरून येईल असं वाटत नाही. या कथेत शेटजी नावाचे एक पात्र आहे. हा कथासंग्रह लिहिला तेव्हा गांधीयुग होते. त्यामुळे गांधीजींची शिकवण कथासंग्रहात डोकावते आहे. कथेतील शेटजी गांधीजींच्या व्याख्यानाला जातात, पुतळा उभारण्यासाठी सढळ हाताने मदत करतात. रोशन नावाच्या आपल्या रखेलीवर वारेमाप खर्च करताट., पण एका हरिजन विद्यार्थ्यास शिकायला पैसे देत नाहीत. यालाच म्हणतात खायचे दात वेगळे व दाखवायचे वेगळे. समाजातही अशाच रूपाची अनेक माणसे दिसून येतात. मयत झालेल्या व्यक्तीस खांदा द्यायला पुण्य समजतात, श्रदांजली लिहिताना भावूक होतात, पण नियातीपुढे हतबल झालेल्या जिवंत माणसास टेकू देण्यास असमर्थतता व्यक्त करतात.

दोन मोसंबी :   

दुःख मांंडताना वेदनेच्या भळभळीलाही फुलांच्या महिरपीत सजवावं .हे भाऊंचे वैशिष्ट्ये .दोन मोसंबी ही कथा वाचताना अश्रू येतात.या कथेचा नायक एक कवी आहे.कवीची भाची आजारी असते.तिला दोन मोसंब्या हव्या असतात.पण जगाचं सुख दुःख मांडणा-या शब्दानं श्रीमंत असलेल्या कवीच्या खिशात दमडीही नसते.खिशात एखादा आणा सापडतो का ? हे चाचपण्यासाठी कवी खिशात हात घालतो ,तर खिशात पैसा नव्हताच पण कविता लिहिलेला एक कागद सापडतो.कवितेवर काही पैसे मिळतील व भाचीसाठी मोसंबी घेता येईल म्हणून कवी संपादक ,चित्रपट व्यावसायिक यांच्याकडे जातो.कुठेही पैसा मिळत नाही पण अवहेलना मात्र खिसाभरून मिळते.इकडे आजारी भाचीला झोप लागते.झोपेतच तिला दोन मोसंब्या मिळाल्याचं स्वप्न पडतं.अन् या स्वप्नाच्या बळावरच ती ठणठणीत बरी होते.स्वप्नावरचं जीणं म्हणजे गरीबीचं आवसान होय.मूळ कथा आपण वाचावी.

सोन्याची गाडी :

ही कथा मूल्य पेरणारी कथा आहे. कथेचा नायक दादासाहेब लहाणपणी चोरी करतो. दादासाहेबांचे वडील त्यांना खूप मारतात. पण रात्रीच्यावेळी सगळे झोपलेले असताना वडील ढसढस रडत असतात. उरातला बाप अंधारात उफाळून आलेला असतो. स्फूंदण्याचा आवाज ऐकून बालपणीचे दादासाहेब उठून वडिलांजवळ येतात. लेखकाने बाप-लेकातील रंगवलेला संवाद कोण्याही काळातील बापलेकाची भाषा आहे. तो संवाद म्हणजे अमर उपदेश आहे. मुलाने चोरी केल्याचे कळताच हवालदिल झालेल्या बापाच्या मनात येतं..  गुलाबाच्या झाडाला कुठून कीड लागते कळत नाही. पण कीड लागल्याचे कळताच त्याच्या फांद्या वेळीच छाटाव्या लागतात नाहीतर झाड मरून जातं. वडील मुलाला सांगतात …  विकाराची वाळवी मनाला लागली की पोखरलेल्या मनामुळे आयुष्य भंगूर व्हायला वेळ लागत नाही.

सांजवात : 

कथासंग्रहाचे शीर्षक असलेली सांजवात ही या पुस्तकातली शेवटची कथा. देशभक्ती ,ध्येय व तत्व यांची सांगड म्हणजे सांजवात. सांजवात कथेचा नायक दिनकर गांधीजींच्या विचाराने भारावलेला आहे. तो स्वतः नास्तिक आहे. पण त्याची आई दररोज तुळशीवृंदावनापुढे सांजवात लावत असते. आई म्हणजे दिनकरचा गुरूच. सांजवात लावण्यामागचे कारणही आई त्याला सांगत असते, पण दिनकरला ते पटत नाही.1942 च्या क्रांतिकारी आंदोलनात तो सक्रीय सहभागी असतो. गांधीजींच्या विचाराने तो भारावलेला असतो. पण आईला व भावाला त्रास होऊ नये म्हणून तो माफीचा साक्षीदार व्हायचे ठरवतो. आईला याची कुणकुण लागताच ती त्याला जे सांगते त्या मातृपदेशाला तोडच नाही. मॕक्झिम गॉर्की लिखित आई कादंबरीची आठवण व्हावी असा तो प्रसंग आहे. आई दिनकरला म्हणते .. “ बाळा असं कृतघ्न होऊ नकोस. देशासाठी तू फासावर जा.” … खरं तर असे सर्वच संवाद मूळ कथेत वाचायला हवेत. .

आईचा काही दिवसानंतर मृत्यू होतो. आईच्या मृत्यूनंतर नास्तिक असलेला दिनकर उठतो व तुळशी वृंदावनासमोर सांजवात लावतो. ती वात म्हणजे आपली आईच आहे,असं त्याला वाटत असते. आईच्या मृत्यूनंतर तो दररोज सांजवात लावतो. 

… भाऊंनी जे जे लिहिलं ते अमर ,अभिजात आहे. भाऊंनी लिहिलेल्या साहित्यावर एकूण २८  चित्रपट निघाले आहेत. देशातील व परदेशातील काही भाषांत त्यांची पुस्तके अनुवादित झालेली आहेत.ही गोष्ट त्यांचे अलौकिकत्व सिद्ध करते.

आज भाऊंचा स्मृतिदिन. स्मृतिदिनी भाऊंना विनम्र अभिवादन करताना एक गोष्ट सांगण्यास मला स्वतःचाच अत्यंतिक अभिमान वाटतो की भाऊंनी लिहिलेल्या सर्व कादंब-या ,तीन कथासंग्रह मी  वाचलेली आहेत. पण एकही नाटक न वाचल्याची खंत आहे हेही तितकेच खरे. 

– समाप्त – 

© श्री कचरू चांभारे

संपर्क – मुख्याध्यापक, जि. प. प्रा. शाळा, मन्यारवाडी, ता. जि. बीड

मो – 9421384434 ईमेल –  [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ वि. स. खांडेकर स्मृतिदिनानिमित्त – आठवणींची सांजवात… भाग-१ ☆ श्री कचरू चांभारे ☆

श्री कचरू चांभारे

? इंद्रधनुष्य ?

☆ वि. स. खांडेकर स्मृतिदिनानिमित्त – आठवणींची सांजवात… भाग-१ ☆ श्री कचरू चांभारे ☆

2 सप्टेंबर हा दिवस वि. स. खांडेकर यांचा स्मृतिदिन. विष्णू सखाराम खांडेकर म्हणजे मराठी साहित्यातला कोहिनूर हिरा.एका शब्दाच्या स्पष्टीकरणासाठी त्या शब्दाला उपमानाचे विविध अलंकार चढवून ,इंद्रधनूची कमान सजवून तो शब्द मांडावा तो खांडेकरांनीच. वि.स.ना भाऊ या नावाने संबोधत असत, पण हेच भाऊ साहित्यातला ‘ दादा ‘ माणूस होता ,बाप माणूस होता.

ऊंचा जन्म कोकणातला .आजोळचं राहणं एका गणपती मंदिरातलं. गणपती मंदिरातच त्यांचा जन्म झाला म्हणून त्यांचे नाव गणेश ठेवले होते. गणेश आत्माराम खांडेकर हा बालक शाळेत खूप हुशार होता. वडिलांचं छत्र जास्त दिवस मिळालं नाही. बाल गणेश जेमतेम बारा तेरा वर्षाचा असतानाच वडील सोडून गेले. मामाच्या मदतीने त्यांनी उच्च शिक्षण घेतले. 1913 साली ते मॕट्रिक उत्तीर्ण झाले तेव्हा अहमदाबाद ,बेळगाव,मुंबई या बोर्डातून ते पहिल्या दहात होते. वाचन व लिहिण्याची त्यांना खूप आवड होती.सोळाव्या वर्षीच त्यांनी ‘ रमणीरत्न ‘ नावाचे नाटक लिहिले होते.त्यावेळचे प्रख्यात नाटककार वासुदेवा शास्त्री त्यांना म्हणाले होते की ,’ हे नाटक तू लिहिले आहेस.यावर कुणाचाच विश्वास बसणार नाही.’ ते नाटक म्हणजे उत्कट प्रेमाचा आशय होता.हे नाटक प्रकाशित होऊ शकले नाही.

शिरोडे जि.सिंधुदुर्ग येथे भाऊंनी जवळपास अठरा वर्षे शिक्षक म्हणून काम केले. ययाति,अमृतवेल वगळता त्यांच्या अनेक साहित्यकृती शिरोड्याच्या शाळेतच जन्माला आल्या. ‘ हृदयाची हाक’ ही  पहिली कादंबरी लिहिली व भाऊ थेट  ज्ञानपीठापर्यंत पोहचले. साहित्य क्षेत्रातलं सर्वोच्च मानाचं पद स्वीकारत असताना त्यांच्या पूर्णतः दृष्टीहीन डोळ्यात सगळा जीवन चित्रपट उसळला असेल. वडिलांच्या मृत्यूनंतर ते खूप पोरके झाले होते. मामा वगळता जवळच्या नात्यातून कोणाची मदत होत नव्हती. त्यांचे चुलते सखाराम यांनीही मदत नाकारली होती. या सखारामला चौदा अपत्य होऊनही फक्त एकटी वारणाक्का जिवंत होती. पुढे याच सखारामने वारसा चालविण्यासाठी गणेशला दत्तक घेतले व हा गणेश म्हणजेच तिथून पुढचा विष्णू सखाराम खांडेकर होय. वारणाक्का बहिणीने दिलेले भाऊ हे कौटुंबिक नाव त्यांना आयुष्यभर चिटकून राहिले.

भाऊंनी अमर्याद लेखन केले. लेखनाचे विषय व त्या विषय अनुषंगाने उभी केलेली पात्रे अजरामर झाली.

‘रिकामा देव्हारा‘ ही त्यांची कादंंबरी स्त्रीचे महत्व सांगणारी आहे. ज्या घरात स्त्रीस देवतेसमान मानले जात नाही, ते घर म्हणजे रिकामा देव्हाराच होय. एवढ्या एका ओळीवरून कादंबरीच्या विषयाची प्रचिती येते. ‘ जळलेला मोहर ‘ मांडताना त्यांनी स्वप्नभंग झालेल्या स्त्रीची कथा मांडली आहे.’ अश्रू ‘ कादंबरीचा नायक म्हणजे शिक्षकी व्यवसायतल्या गुरूजीच्या तत्वनिष्ठेचा उत्कृष्ट नमुना होय.

लहानपणीपासूनच प्रकृतीने कृश असलेल्या खांडेकरांना उत्तम प्रकृतीमानाचे स्वास्थ्य लाभले नाही. दोन्ही डोळे अधू होते .कणकण व अंगातला ताप तर कायम पाचवीला पुजलेला. शिरोडे येथे कार्यरत असताना एकदा सर्पदंशही झाला होता. वाढत्या वयानुसार डोळ्याचा नंबरही वाढत गेला.1972 साली भाऊंच्या डोळ्याची शस्त्रक्रिया करावी लागली. दुर्दैवाने शस्त्रक्रिया अयशस्वी ठरली  व  जगाला शब्दसूर्याचा प्रकाश देणारा हा शब्दमहर्षी कायमचा अंधकारमय झाला. चार लेकरं पदरात देऊन पत्नीनेही जाण्याची घाईच केलेली होती. जीवापाड जपलेली उषा ,अर्ध्या वाटेतच काळोख करून गेली होती. पत्नीवियोगानंतरचं आयुष्य अत्यंतिक खडतर असतं. पत्नी उषाताईच्या अकाली जाण्याने भाऊ खचले होते .वाचन व लेखन या दोन शक्ती त्यांच्या प्राण होत्या. मंदाकिनी ही त्यांची लेक भाऊंची आईच झाली होती. स्वतःची नोकरी सांभाळत तिनं अंध भाऊचे आजारपण सक्षमपणे पेलले होते अगदी शेवटच्या क्षणापर्यंत. 

राम गणेश गडकरी हे वि.स.खांडेकरांचे गुरू. एकदा बालगंधर्वाच्या घरी गडकरी व विशीतला वि.स.गेले होते. त्यावेळी हा तरूण कोण ? या बालगंधर्वाच्या प्रश्नाला उत्तर देताना गडकरी म्हणाले होते.. ‘  हा तरूण श्रीपाद कोल्हटकरांच्या गादीचा वारसदार आहे.’ त्या काळात सांगली म्हणजे नाट्यासाठी स्वर्गभूमी होती व श्रीपाद कृष्ण कोल्हटकर या रंगभूमीचे निर्विवाद देव होते. इतक्या मोठ्या माणसासोबत झालेली तुलना व तुलना करणारे गडकरी म्हणजे साहित्य क्षेत्रातला अढळ तारा…. या दोन्हीचा सुखात्म परिणाम खांडेकरांच्या हृदयात लेखनाचे बीज पेरून गेला व त्यांनी जे पेरले ते आज जगासमोर आहे. स्वातंत्र्य,  समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता व लोकशाही या मूल्यांची कास वि.स.खांडेकरांच्या लेखनात दिसून येते. प्रस्तावना हे भाऊंचे खास बलस्थान. औपचारिक प्रस्तावना असं न लिहिता भाऊ ‘ दोन शब्द ‘ असं लिहून पुस्तकाची पार्श्वभूमी लिहितात. ‘ पहिले प्रेम ‘ या पुस्तकाला तर कादंबरीपेक्षा प्रस्तावनाच मोठी वाटावी इतकी ती विस्तृत आहे. स्वतःच्या सर्व ग्रंथासह इतर ६३ लेखकांसाठी त्यांनी प्रस्तावना लिहिली आहे.

त्यांच्या प्रस्तावनेचे गारूड कुसुगाग्रजांच्या नजरेतून सुटले नाही. कुसुमाग्रजांनी वि.स.च्या प्रस्तावनेवर एक ग्रंथ लिहिलेला आहे. साहित्य क्षेत्राततल्या एका प्रज्ञासूर्याला दुस-या प्रज्ञासूर्याकडून वेगळी मानवंदना काय असू शकते ? नाटक, कादंबरी, समीक्षा ,कविता, कथासंग्रह ,ललितलेखन,निबंधलेखन,नियतकालिकासाठी स्तंभ लेखन,संपादन, अग्रलेख….  असं जे जे म्हणून साहित्यातलं काही असेल त्या प्रत्येक क्षेत्रात भाऊंनी एखाद्या चक्रवर्ती सम्राटाप्रमाणे अनभिषक्त राज्य केले आहे. तुमची कोणती साहित्यकृती तुम्हाला फार आवडते ?असं भाऊंना विचारल्यावर भाऊ मिश्किलपणे म्हणत.. ‘ आईला सगळी लेकरं सारखीच.’ तरीही भाऊंना ‘ उल्का ‘ कादंबरी खूप आवडत असे. त्यांनी उल्केच्या प्रास्ताविकातही हे लिहिलं आहे.

उल्का म्हणजे काही अंशी त्यांचं स्वतःचं कथानक आहे. तत्वाला मुरड घालणाऱ्या व मरेपर्यंत तत्वाला चिकटून राहणाऱ्या अशा दोन मतप्रवाहांची कथा म्हणजे उल्का. या कादंबरीत भाऊसाहेब हे एक पात्र आहे. अनेक लोकांना हे पात्र म्हणजे वि.स.खांडेकरच वाटतात. वि.स.खांडेकर लेखनाच्या श्रीमंतीत कुबेराहून अधिक श्रीमंतीचं जीवन जगले पण आर्थिक सारीपाटावर त्यांचे घर नेहमीच दैन्यावस्थेचे प्रतीक राहिले.सहकारी शिक्षकमित्राच्या मुलीच्या लग्नासाठी स्वतःच्या एका कादंबरीचे संपूर्ण मानधन देणारा हा दाता ,स्वतःसाठी मदतीची याचना करू शकला नाही. अप्रत्यक्षपणे त्यांनी मांडलेली विवंचना लोकांना पुस्तकाचाच भाग वाटली.

– क्रमशः भाग पहिला 

© श्री कचरू चांभारे

संपर्क – मुख्याध्यापक, जि. प. प्रा. शाळा, मन्यारवाडी, ता. जि. बीड

मो – 9421384434 ईमेल –  [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “एका गांधी टोपीचा प्रवास …” ☆ श्री हेमंत तांबे ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ “एका गांधी टोपीचा प्रवास …” ☆ श्री हेमंत तांबे ☆

आपण स्व. पु.ल.देशपांडे यांचं खिल्ली हे पुस्तक वाचलं असेलच.

त्यातील ” एका गांधी टोपीचा प्रवास ” पु.लं.च्या भाषेत देतो….. 

स्वातंत्र्याला फक्त पंचवीस वर्षे झाली होती !

पु.ल. लिहितात……

राष्ट्रीय चळवळीत भाग घेतलेल्या एका वृद्ध स्नेह्याला मी विचारलं, ” गेल्या पंचवीस वर्षांत कशात जास्त परिवर्तन झालं, असं तुम्हाला वाटतं?”

” गांधी टोपीत ! ” ते म्हणाले.

” ते कसं काय? ” 

” पूर्वी गांधी टोपी घालायला इंग्रज सरकारची भीति वाटत असे. आता आपल्याच जनतेची भीती वाटते.”

“असं का म्हणता? “

” तूच पाहा, गांधी टोपी, पायघोळ धोतर, खादीचा झब्बा आणि जाकीट घालून हातात कातडी ॲटॅची घेतलेल्या माणसाविषयी तुझं प्रथमदर्शनी काय मत होतं? “

पु.ल. बोलले नाहीत !

या गांधी टोपीचा प्रवास मला पु.लं.कडून नीट कळला आणि मोठं झाल्यावर मी अनुभव सुध्दा घेतला.

पण या टोपीचा उगम कसा झाला ? हा प्रश्न त्रास देत असे ! मग तो शोध सुरू झाला…… 

 १) १९१९ साली मोहनदास रामपूरच्या नवाबाला भेटायला गेले होते. त्यावेळी डोक्यावर काहीतरी हवं म्हणून तिथल्याच एका दर्जीकडून त्यांनी एक टोपी शिवून घेतली होती…  ती गांधी टोपी !

२) एका ठिकाणी कै. काका कालेलकर यांच्यासोबत मोहनदास बोलत असताना, आपल्या डोक्याला सूट होणारी टोपी शोधत असताना, या टोपीचा शोध लागला, असं मोहनदास म्हणतात….. असा तो जन्म !

ही टोपी मोहनदासांनी १९१९ — १९२१ घातली… लोकमान्य १९२० मध्ये स्वर्गवासी झाल्यावर स्वातंत्र्य चळवळ मोहनदासांच्या हातात आली…. तोपर्यंत टोपीचा उपयोग मोहनदासांनी शिकून घेतला होता !

१९२१ नंतरचा मोहनदासांचा टोपी घातलेला फोटो शोधून मिळत नाही….. 

….

मला भविष्य सांगता येत नाही, पण भूतकाळ थोडा माहिती आहे.

ती जुनी, छान, ‘ टोपीवाला आणि माकडं ‘ ही गोष्ट तुम्हाला माहीत आहेच… तिची पुनरावृत्ती करत नाही !

पण त्या गोष्टीचा दुसरा भाग तुम्हाला माहीत नाही. तो असा —                                                                                

तो मूळ टोपीवाला, म्हातारा होऊन मरण्यापूर्वी त्यानं आपल्या मुलाला ती गोष्ट सांगून बजावलं, ” कधी तुझ्यावर जर माझ्यासारखी वेळ आली, तर लक्षात ठेव आपल्या डोक्यावरील टोपी खाली काढून टाकायची, आपल्या सर्व टोप्या परत मिळतात.”….आणि त्या म्हाताऱ्यानं डोळे मिटले !

मुलगा टोप्यांचाच व्यवसाय करत होता. दररोज फिरून टोप्या विकत असे… एकदा फिरून थकला, भागला आणि एका झाडाखाली बसला. जेवून जरा झप्पी घेऊन उठला तर टोप्या गायब… वर पाहतो तर माकडांच्या डोक्यात टोप्या. त्याला बापानं माकडांची मानसिकता सांगितली होती…. त्यानं आपल्या डोक्यावरील टोपी काढून खाली टाकली… चटकन एक टोपी न मिळालेलं माकड खाली येऊन ती टोपी घेऊन झाडावर गेलं !

हा विचार करू लागला, ‘असं कसं घडलं? ….’ .तोपर्यंत ती माकडं टोप्या घेऊन जाताना दिसली. यानं विनवणी केली, ‘ असं करू नका, माझ्या टोप्या परत द्या, please.’ 

एक माकड थांबून म्हणालं, ” आता आपली भेट २०१४ साली, तोपर्यंत टोप्या आमच्या डोक्यावर  ….. ! “

© श्री हेमंत तांबे

पाटगाव. 

मो – 9403461688

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ असाही एक सफाई कामगार !  ☆ प्रस्तुती – श्री मेघ:शाम सोनावणे ☆

श्री मेघ:श्याम सोनावणे

? इंद्रधनुष्य ?

असाही एक सफाई कामगार !  ☆ प्रस्तुती – श्री मेघ:शाम सोनावणे ☆

१९९८ सालची गोष्ट. क्षेपणास्त्रे (मिसाईल) बनवण्यासाठी भारताचे जोरदार प्रयत्न चालू होते. अमेरिकेच्या उपग्रहांना सुगावा लागू नये म्हणून क्षेपणास्त्रांच्या प्रकल्पाबाबत कमालीची गुप्तता राखली जात होती. क्षेपणास्त्रांकरिता आवश्यक असलेली क्रायोजेनिक इंजिन्स गुप्तपणे चेन्नई बंदरामध्ये आणली जात होती. तेथून ती इंजिन्स हवाई मार्गाने पुढे नेण्याची योजना होती. त्यासाठी भारतीय वायुसेनेची हेवी लिफ्ट हेलिकॉप्टर्स वापरली जाणार होती.

चेन्नई बंदरापासून क्षेपणास्त्रांच्या लॉन्च पॅडपर्यंत पोहोचण्याकरता हेलिकॉप्टरला दोन तास पुरेसे होते. परंतु, अमेरिकेच्या उपग्रहांना चकवण्यासाठी, नागमोडी मार्गाने उडत, आणि चार वेगवेगळ्या ठिकाणी दोन-दोन तास थांबे घेत जाण्याचे आदेश हेलिकॉप्टर्सच्या वैमानिकांना दिले गेले होते. त्यामुळे, प्रत्यक्षात दोन तासांचा असलेला प्रवास आम्ही सोळा तासांमध्ये पूर्ण करणार होतो. अर्थात, आपल्या राष्ट्रीय उद्दिष्टांबाबत गुप्तता राखण्यासाठी मोजली जाणारी ही किंमत अगदीच नगण्य होती.

हेलिकॉप्टरमध्ये वजनदार क्रायोजेनिक इंजिने ठेवलेली असल्याने, प्रवासी क्षमतेवर खूपच मर्यादा आली होती. क्षेपणास्त्र प्रकल्पाचे फक्त १२ कर्मचारीच एकावेळी इंजिनसोबत प्रवास करू शकणार होते. या १२ कर्मचाऱ्यांमध्ये दोन सफाई कामगारांचाही समावेश होता. त्याचे कारण असे की, क्रायोजेनिक इंजिनमधून सतत गळून  हेलिकॉप्टरमध्ये सांडणारे तेल व क्रायोजेनिक इंधन वेळोवेळी स्वच्छ करत राहणे आवश्यक होते. 

भारत सरकारच्या सर्वोच्च पातळीवर ज्यांची नावे मंजूर झालेली होती अशा कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त कोणालाही हेलिकॉप्टरमध्ये प्रवेश देऊ नये असे स्पष्ट आदेश आम्हाला होते. परंतु, सफाई कामगारांपैकी एखादा कामगार बदलून त्याच्या जागी ऐनवेळी दुसरा कामगार नेमण्याचे अपवादात्मक विशेषाधिकार क्षेपणास्त्र प्रकल्प निदेशकांना दिलेले होते. मात्र त्यासाठी प्रकल्प निदेशकांची लेखी परवानगी त्या कामगाराच्या हातात असणे आवश्यक होते.

चेन्नईहून आम्ही निघण्याच्या तयारीत होतो. इतक्यात, भुरकट लांब केस असलेला एक माणूस आमच्यापाशी येऊन म्हणाला, ” मला लॉंच साईटवर पोहोचणं अत्यावश्यक आहे, पण माझी फ्लाईट चुकलीय. मला तुमच्यासोबत जाण्याशिवाय पर्याय नाही. प्लीज मला घेऊन चला.” …. पण आमच्या हेलिकॉप्टरमध्ये प्रवास करणाऱ्या कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त एकही जादा मनुष्य आम्ही सोबत नेऊ शकणार नव्हतो. त्यामुळे आमच्यापाशीही त्याला नकार देण्यावाचून दुसरा पर्याय नव्हता.

आम्ही अगदी उड्डाण करण्याच्या तयारीत असताना तो मनुष्य पुन्हा आमच्यापाशी धावत-धावत आला आणि म्हणाला, ” हे पहा, माझ्यापाशी प्रकल्प निदेशकांचे लेखी परवानापत्र आहे. अमुक-अमुक सफाई कामगाराच्या ऐवजी मला जागा दिली गेली आहे.” … आता काहीच हरकत नसल्यामुळे, मुख्य वैमानिकाने त्याला चढायची परवानगी दिली. एखाद्या लहान मुलाप्रमाणे आनंदाने उडी मारून तो मनुष्य हेलिकॉप्टर मध्ये चढला. 

आमच्या प्रवासाचा एक टप्पा पूर्ण करून आम्ही एके ठिकाणी थांबलो होतो. चार तासांचा हॉल्ट होता. आम्ही निवांत चहा पीत बसलो होतो. तिथूनच आम्हाला दिसले की तो मनुष्य हेलिकॉप्टरचा अंतर्भाग अगदी काळजीपूर्वक पुसून काढत होता. आमच्या सोबतच्या कर्मचारीवर्गात काही वरिष्ठ शास्त्रज्ञ देखील होते. ते त्या माणसाशी काहीतरी बोलत असल्याचे आम्हाला दिसले. 

इतक्यातच एक शास्त्रज्ञ धावत आमच्यापाशी आला आणि म्हणाला, “अहो, ते जे हेलिकॉप्टर स्वच्छ करतायत त्यांना प्लीज थांबवा. ते आमचं ऐकत नाहीयेत. ते स्वतःच आमच्या क्षेपणास्त्र प्रकल्पाचे निदेशक आहेत, डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम !”

हे ऐकून आम्हाला धक्काच बसला. आमच्या मुख्य वैमानिकाने लगेच जाऊन त्यांना ते काम थांबवण्याची विनंती केली. त्यावर हसून ते इतकेच म्हणाले, ” मी या हेलिकॉप्टरमध्ये एक सफाई कामगार म्हणून प्रवास करत आहे. माझे कर्तव्य बजावण्यापासून तुम्ही कृपया मला रोखू नका.” आमचा नाईलाज झाला. त्यापुढच्या हॉल्टमध्येही या सद्गृहस्थांची कर्तव्यपूर्ती अव्याहत चालू राहिली. अक्षरशः हतबुद्ध होऊन पाहत राहण्यापलीकडे आम्ही काहीच करू शकत नव्हतो. गंतव्यस्थानी पोहोचल्यानंतर आम्ही या अजब प्रकल्प निदेशकाचा आणि त्याच्या टीमचा हसतमुखाने निरोप घेतला. 

या घटनेनंतर बऱ्याच वर्षांनी मला राष्ट्रपती भवनातून एक निमंत्रणपत्र आले. राष्ट्रपतींनी तेथील ‘ मुघल गार्डन्स ‘ चा केलेला कायापालट मी पहावा आणि राष्ट्रपती एक सफाई कामगार म्हणून चांगले आहेत की ते त्याहून अधिक चांगले माळी आहेत हे मी सांगावे, असे त्या पत्रात लिहिले होते ! 

त्या काळी मी परदेशात असल्याने, आमंत्रण स्वीकारू शकत नसल्याचे मी विनम्रतापूर्वक कळवले. 

कालांतराने, माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची मी आवर्जून भेट घेतली. तेंव्हाही त्यांनी खळखळून हसत त्या जुन्या प्रसंगाची आठवण जागवली. 

… एका असामान्य भारतीयाला माझा सॅल्यूट !

मूळ इंग्रजी अनुभव लेखक: विंग कमांडर अब्दुल नासिर हनफी, वीर चक्र, (सेवानिवृत्त)

मराठी भावानुवाद  : कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त) ९४२२८७०२९४

संग्राहक : मेघ:शाम सोनावणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “नागपंचमी …नागपूजेच्या पलिकडे…” – माहिती संकलन : सतीश खाडे ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

🌈 इंद्रधनुष्य 🌈

☆ “नागपंचमी …नागपूजेच्या पलिकडे…” – लेखक : अज्ञात ☆ श्री मोहन निमोणकर

साप आपले मित्र आहेत, निरुपद्रवी आहेत हे प्रत्यक्ष कृतीतून निलिमकुमार खैरेंनी दाखवले…त्यासाठी किती मोठे धाडस केले…त्याचा हा छोटासा वृत्तांत…

थोड्याच दिवसांत प्रकाश कर्दळे (निवासी संपादक, इंडीयन एक्सप्रेस) यांनी ही बातमी देशभर व्हायरल केली … ‘नीलिमकुमार खैरे बहात्तर विषारी सापांच्या सान्निध्यात बहात्तर तास राहून नवा जागतिक विक्रम प्रस्थापित करणार…’

बातमी देशभर पसरली. आम्ही सगळेच जोशात तयारीला लागलो. अण्णा (निलिमकुमार खैरे) त्या वेळी ब्लू डायमंडमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून काम करत होता. जगप्रसिद्ध उद्योगपती शंतनुराव किर्लोस्करांचे धाकटे बंधू कै. पी. एल. किर्लोस्कर हे त्यावेळी ब्लू डायमंड हॉटेलचे कार्यकारी संचालक होते. खूपच सरळमार्गी आणि  सज्जन उद्योगपती असा त्यांचा लौकिक होता. अण्णाच्या आगामी विश्वविक्रमाची योजना आम्ही त्यांच्यासमोर मांडली. त्यांना ती पसंत पडली. आपल्या कंपनीचा एक तरुण कर्मचारी जागतिक विक्रम करण्याचा प्रयत्न करतोय याचं त्यांना समाधान वाटलं. त्यांनी आर्थिक सहाय्य करण्याचंही मान्य केलं. माझा मित्र सुहास बुलबुले तेव्हा बी. जे. मेडिकल कॉलेजचा ‘कॉलेज रिप्रेझेंटेटिव्ह’ होता. त्याच्यामुळे बी.जे.च्या मैदानावर हे वर्ल्ड रेकॉर्ड करण्याचं ठरलं. आवश्यक त्या परवानग्या मिळवल्या आणि आम्ही खोली बांधण्याच्या मागे लागलो. ॲक्रिलिक शीट्स वापरून १० फूट बाय १० फूट आकाराची पारदर्शक खोली तयार केली. खाली वाळू पसरली. आतमध्ये बसण्यासाठी एक आरामखुर्ची ठेवली. दुसरीकडे विषारी साप गोळा काम सुरू होतं. आमचा सर्पप्रेमी मित्र राजन शिर्के याच्या नेतृत्वाखाली पुण्यातल्या सर्व सर्पमित्रांनी विषारी साप जमवायला सुरुवात केली. कलकत्ता स्नेक पार्कचे संस्थापक दीपक मित्रा अण्णाबद्दलची बातमी वाचून त्यांच्याकडचे विषारी साप घेऊन स्वतः पुण्यात आले. अखेर ठिकठिकाणाहून नाग, माया घोणस, फुरसं आणि पट्टेरी मण्यार अशा एकूण ७२ विषारी सापांची जमवाजम झाली. दरम्यान, मी इंग्लंडच्या गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स या कंपनी संपर्क साधून होतो. या रेकॉर्ड्ससाठी त्याच क्षेत्रातील दोन व्यक्तींची रेफरी किंवा पंच म्हणून नेमणूक केली जाते. मुंबईच्या हाफकिन इन्स्टिट्यूटचे उपसंचालक तसंच सर्पविषतज्ज्ञ डॉ. नीलकंठ वाड आणि पुण्याच्या मॉडर्न कॉलेजच्या प्राणिशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. एस. वाय. परांजपे या दोन प्रतियश शास्त्रज्ञांची अण्णाच्या वर्ल्ड रेकॉर्डसाठी रेफरी म्हणून नियुक्ती झाली. त्यांनी एक रजिस्टर तयार केलं होतं. दर तासाला अण्णाच्या आणि सापांच्या हालचालीच्या डोळ्यात तेल घालून नोंदी घेऊन त्यावर दोघांना सह्या करायच्या होत्या.अखेर सगळी तयारी झाली आणि २० जानेवारी १९८० रविवारी या दिवशी दुपारी चार वाजता अण्णाने सापांच्या खोलीत प्रवेश केला. पुढचे बहात्तर तास नाट्यमय असणार होते. अण्णाला काही होणार नाही याची मनोमन खात्री होती. तरीही थोडी धाकधूक होतीच. अण्णा आत गेला तेव्हा त्याच्या आरामखुचीवर काही साप आरामात विराजमान झालेले होते. बऱ्याच वेळाने अण्णाला खुर्चीवर बसायला जागा मिळाली. या काळात काही सापांनी एकमेकांशी भांडणं उकरून काढली. अण्णानेच ती सोडवली. थंडीमुळे काही साप त्याच्या टी- शर्टमध्ये घुसले. अण्णाने एकेका सापाला हलकेच धरून बाहेर काढलं पण एकाला काढलं की त्याच्या जागी दुसरा हजर! शेवटी हताश होऊन अण्णा तसाच झोपून गेला. दहा-बारा सापही त्याच्या टी-शर्टमध्येच झोपले. आम्हालाही बाहेर डोळा लागला. सकाळ झाल्यावर अण्णाने एकेका सापाला हलकेच बाहेर काढून बाजूला ठेवलं आणि चहा घेतला. नियोजित वर्ल्ड रेकॉर्डच्या बहात्तरपैकी चौदा तास संपून गेले होते. अजूनही अठावन्न तास बाकी होते. दरम्यान, ब्लू डायमंड हॉटेलमधून खास अण्णासाठी सॅण्डविचेस आणि फुट ज्यूस आला होता. अण्णाने फक्त थोडा ज्यूस घेतला. सॅण्डविचेस आम्ही संपवली.

आता अण्णा आणि साप जणू एकमेकांसोबत एकरूप झाले होते. सुरुवातीला त्या खोलीत ७२ साप आणि एक माणूस होता. पण आता मात्र एका खोलीत एकत्र नांदणारे ते ७३ प्राणी होते.

अण्णाचा हा विक्रम बघण्यासाठी तीनही दिवस पुणेकरांची प्रचंड गर्दी होत होती. एवढे विषारी साप अंगाखांद्यावर खेळत असूनही माणसाला चावत नाहीत, हा लोकांसाठी चमत्कारच होता. त्यामुळे थक्क होऊन लोक त्याकडे पाहत राहत. ज्या कारणासाठी आम्ही काम करत होतो आणि ज्यासाठी अण्णाने हा जागतिक विक्रम करण्याचा घाट घातला होता तो सफल होताना पाहून समाधान वाटत होतं. अत्यंत थरारक आणि नाट्यमय असे तीन दिवस होते ते. अण्णासाठी तर होतेच, पण आमच्यासाठीही होते. त्या तीन दिवसांत आई-दादांची अवस्था काय झाली असेल याची कल्पनाच केलेली बरी. ते दोघंही खाणंपिणं आणि झोप -सोडून घरीच थांबले होते. आई तर तीन दिवस देव पाण्यात ठेवून बसली होती.

अखेर ७२ तास संपत आले. जागतिक विक्रम घडण्याची वेळ आली! या आगळ्यावेगळ्या विक्रमाच्या पूर्ततेप्रसंगी शंतनुराव किर्लोस्कर स्वतः जातीने हजर होते. पुण्यातले आणि राज्यातले आमचे सर्प आणि प्राणिमित्रही गोळा झाले होते. दीपक मित्रांसारखी राज्याबाहेरून आलेली मंडळीही होती. बुधवारी, २३ जानेवारीला दुपारी चार वाजता दीपकने केबिनच्या दाराची कडी काढली. बाहेर येताच अण्णाने त्याला आलिंगन दिलं. त्या दोघांचे आणि आमचेही डोळे आनंदाश्रूंनी भरून वाहत होते. त्यानंतर पत्रकार परिषद पार पडली. अण्णाचे अनेक फोटो काढले गेले. त्यानंतर मी ‘गिनीज बुक’च्या लंडनमधल्या मुख्य कार्यालयात जागतिक विक्रम प्रस्थापित झाल्याचं वृत्त विश्रामबाग- वाड्याजवळच्या ऑफिसमधून तारेने कळवून टाकलं. अण्णाने जागतिक विक्रम कला होता. ७२ तासांपूर्वी माणसांचा एक प्रतिनिधी सापांच्या सान्निध्यात रहायला गेला आणि ७२ तासांनंतर तो सापांचा प्रतिनिधी बनून माणसांत आला होता! पुढे आयुष्यभर अण्णा सापांचा अन् प्राण्यांचा प्रतिनिधी म्हणूनच काम करत राहिला. आजही करतो आहे.

— ‘सोयरे वनचरे’ (ले.अनिल खैरे) या पुस्तकातून

(माहिती संकलन : सतीश खाडे,पुणे)

प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “गावांच्या नावातही मजा आहे…” ☆ श्री कचरू चांभारे ☆

श्री कचरू चांभारे

? इंद्रधनुष्य ?

☆ “गावांच्या नावातही मजा आहे…” ☆ श्री कचरू चांभारे ☆

गावांच्या नावातही मजा आहे. चला जरा शोधू या 

एकदा मुंबईला जाताना रोडवर एका गावाच्या नावाचा बोर्ड दिसला. गावाचे नाव आहे सरळगाव, ता.मुरबाड जि.ठाणे. .. यात काय नवल ? असं वाटेल. पण नावातच नवल आहे. कारण गाव कधीच सरळ नसतं, पण हे गाव नावाने सरळ आहे.अन् मग काय सरळगावावरून मला अनेक गंमतीशीर गावांची नावे आठवली.

विरुद्ध अर्थी नावाची गावे— उदा.  सरळगाव ×वाकडगाव, वाकडेवाडी, आनंदवाडी ×वैतागवाडी, राजापूर ×राणीपूर,  मोठीवाडी × छोटीवाडी, नवापूर, नवेगाव× जुनेगाव , प्रकाशा × अंधारवाडी, ,लहानगाव × मोटेगाव 

समानार्थी गावाची नावे  — आनंदवाडी – सुखापूर , हातकणंगले — करचुंडी 

प्राण्यांच्या नावावरून गावे — नागपूर ,पालघर ,शेळगाव, हस्तिनापूर, कोल्हापूर,वाघापूर ,डुक्करवाडी , चितेगाव, मोरगाव, धामणगाव, ढेकणमोहा, मांजरसुंबा, मयुर नगर, मन्यारवाडी, म्हैसमाळ,  बकरवाडी, बोकुडदरा ,मासापुरी,

वनस्पतीजन्य गावांची  नावे   — लातूर ,मुगगाव ,परतूर ,शेवगाव , पिंपळवंडी ,आंबेगाव ,वडवणी,  वडगाव ,पिंपळनेर ,बेलगाव ,बाभुळगाव  ,बोरगाव, बोरफडी, जांभळी, जांबसमर्थ, पिंपळगाव, बोरजाई,  बेलापुरी, चिंचपूर ,चिंचाळा, आंबेसावळी ,आंबेजोगाई ,मोहगाव, जामनेर, हिंगणघाट ,पळसगाव, पिंपरी-चिंचवड, कुसळंब, आंबेत

पदार्थ दर्शक नावे   — तेलगाव ,करंजी, जिरेवाडी, मिरी ,दूधगाव ,दुधनी ,साखरखेर्डा , गुळज, हवेली, मालेगाव, वरणगाव, भुसावळ,धनेगाव, इचलकरंजी, ईट

धातू-अधातू दर्शक नावे  — पोलादपूर ,लोखंडी सावरगाव , पारा ,सोनेगाव , तांबाराजुरी ,पौळाचीवाडी,

वनस्पती, प्राणी, शरीर-अवयव दर्शक गावे  —-  हातकणंगले , मानकुरवाडी ,पायतळवाडी ,कानडी, मुळशी, फूलसांगवी, कुंभेफळ ,केसापुरी, कोपरगाव, मानगाव, कानपूर ,डोकेवाडी , तोंडापूर, डोकेवाडा, माथेरान,कोपरा हातनाका, सुरत ,पानगाव,घोटेवाडी,

क्रियापद दर्शक गावे  — जातेगाव , मोजवाडी , करचुंडी, जालना, जळगाव, पळशी, चाटगाव, मांडवजाळी,

संख्यादर्शक गावांची  गावे   — चाळीसगाव ,तीसगाव ,विसापूर ,आठवडी , नवेगाव , नवापूर , सातेफळ,  सातोना, पंचवटी ,पाचेगाव , पाचगणी,सप्तश्रुंगी,चौका, नवरगाव, एकदरा ,त्रिधारा ,चौका

भौगोलिक संज्ञादर्शक गावांची नावे —  चंद्रपूर ,दर्यापूर ,चिखलदरा, मेळघाट, घाटसावळी, घाटजवळा, समुद्रपूर, घाटंजी ,गडचिरोली, गढी, रानमळा , पोलादपूर, मंगळवेढा, संगमनेर

प्राण्यांच्या निवासस्थानावरून पडलेली नावे.… वारूळा, गुहागर

मूल्यदर्शक गावांची नावे.….  समतानगर ,

भावदर्शक गावांची नावे.…  विजयवाडा,पुणे (पुण्य),मौज, तामसा ,महाबळेश्वर 

नातेसंबंध दर्शविणारी गावे….   बापेवाडा, भाऊनगर ,मूल, पणजी, आजेगाव, सासवड

रंगवाचक गावांची नावे….  पांढरवाडी ,काळेगाव, पांढरकवडा, काळेवाडी, तांबडेवाडी, काळभोर

स्त्रीनामवाचक गावांची नावे...   पर्वती ,उमापूर ,सीताबर्डी, गयानगर, द्वारका, भागानगर

पुरूषनामवाचक गावांची नावे…  रामपुरी ,गोरखपूर ,पुरूषोत्तमपुरी ,रामसगाव, दौलताबाद, महादेवदरा,परशू

नदीच्या नावावरून असलेली गावे .… गोदावरी, नर्मदा, वर्धा, गंगानगर

— असंच तुम्हीही काहीतरी शोधा म्हणजे मौज सापडेल.  

© श्री कचरू चांभारे

संपर्क – मुख्याध्यापक, जि. प. प्रा. शाळा, मन्यारवाडी, ता. जि. बीड

मो – 9421384434 ईमेल –  [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ Let’s HOPE ! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ Let’s HOPE ☆ श्री संभाजी बबन गायके 

HOPE (Help One Person Everyday !)

होते कुरूप वेडे पिल्लू तयांत एक ! …. 

त्याच्या आई-बापाने त्याला कोणतंही नाव द्यायला नकार दिला होता. तिथले सगळेच इतर जगाच्या तुलनेत तसे रंगाने काळे. पण हे पिल्लू त्यांच्यापेक्षाही वेगळं निपजलं होतं. हातापायाच्या काड्या आणि मोठाले डोळे,बसकं नाक. आईनं कसंबसं त्याला अंगावर पाजलं काही दिवस.जसं जसं हे पोर मोठं होऊ लागलं तसं बघणारे इतर त्याला विचित्र नजरेनं पाहू लागले! त्यांच्या त्या देशात चेटकीणी मुलांच्या रुपात जन्माला येऊन लोकांना छळतात म्हणे. हे बाळ म्हणजे तशाच एखाद्या चेटकीणीचा मानवी अवतार! बरं,मानवी अवतार म्हणावं तर तसं फारसं माणसासारखं तरी कुठं दिसतंय? लोकांची कुजबूज वाढली. तो पर्यंत बाळ एक वर्षांचा झाला. 

दारिद्र्य,अज्ञान आणि अंधश्रद्धा कायमची वस्तीला आलेल्या त्या पृथ्वीवरच्या नरकाच्या जिवंत देखाव्यात माणुसकी,कणव,सदसदविवेकबुद्धी इत्यादी मानवी गुण औषधालाही आढळत नव्हते. सर्वांनी मिळून त्या बाळाच्या आईबापाला दमदाटी केली…..तुझं पोरगं माणूस नाही…चेटकीण आहे….फेकून दे लगेच ही ब्याद ! … आईबापाला ऐकावं लागलं…आणि त्यांचीही तशीच खात्री पटत चाललेली होतीच काही महिन्यांपासून. त्यांच्या आसपास त्यांनी अशी अनेक चेटकी मुलं पाहिली होती….की ज्यांना लोकांनी दगडांनी ठेचून मारून टाकलं होतं….आपल्या पदरातही असाच निखारा पडला की काय?

एके दिवशी रात्रीच्या अंधारात त्या दोघांनी त्या झोपेत असलेल्या लेकरास उचललं आणि रस्त्यावर आणून टाकलं. त्याला ठेचून मारून टाकण्याची हिंमत नव्हती त्यांच्यात….हे त्या बाळाचं दैव बलवत्तर असल्याचं लक्षण ! 

सकाळ झाली…बाळाने टाहो फोडला. येणा-या-जाणा-यांनी त्याच्याकडे साफ दुर्लक्ष केलं…अशी अनेक मुलं असतात रस्त्यावर फेकलेली. त्यातून हे तर चेटकीणीसारखं दिसणारं पोर….. आठ महिने कशाला म्हणतात? इतक्या दिवस हे बालक जगलं हे कोणत्याही चमत्कारापेक्षा कमी नव्हतंच. कुत्र्याच्या एखाद्या पिलासारखं हे माणसाचं पिलू जमेल तसं जगलं…रस्त्यावर रांगता रांगता हाती लागेल ते तोंडात घातलं….पुढे काही दिवसांत स्वत:च्या पायांवर चालू लागलं…अठरा महिने झाले होते त्याला जन्मून. जंगलात हरीणीची पाडसं जन्मल्या नंतर काही तासांतच उड्या मारू लागतात. खरं तर माणसाच्या अपत्यांना ही सवलत नसते. पण हे मूल आता आपल्या मनानेच मोठं झालं होतं !

ती…समाजसेवेसाठी होतं-नव्हतं ते सारं विकून घराबाहेरच नव्हे तर देशाबाहेर पडलेली तरूणी. उत्तम शिकलेली. एका कापड कंपनीत व्यवस्थापक पदावर नोकरी करीत होती आधी. तत्पूर्वी निम्मं अधिक जग फिरून आलेली. कधी कधी एकटीनं प्रवास केलेला होता तिने. तो ही युरोपात नव्हे तर दारिद्र्य,रोगराई,गुंडगिरी,अंधश्रद्धा यांनी ग्रासलेल्या आफ्रिकी देशांमध्ये. नायजेरीया सारख्या देशांत वेगळं रूप घेऊन जन्मलेल्या मुलांना चेटकीणी समजून त्यांच्या हत्या केल्या जातात, हे तिने पाहिले आणि अनुभवलेही होते. 

नोकरीतून साठवलेले काही पैसे, स्वत:च्या नावे असलेली स्थावर, जंगम मालमत्ता विकून आलेले काही पैसे तिने गाठीशी बांधले आणि ती निघाली….या चेटकीण बालकांना वाचवायला. तिला तिथल्या लोकांनी शक्य तो सर्व त्रास दिला, ती काही महिन्यांची पोटुशी असताना तर तिचं तिच्या एका स्थानिक कार्यकर्त्यासह चक्क अपहरणही झालं होतं पैशांसाठी. तिला अनेकवेळा धमकावण्यातही आलं होतं….ध्येयासाठी सर्वस्व पणाला लावून घर सोडलेली ती….आपलं मानवीय कार्य करीत राहिली. तिचा लाईफ पार्टनरही तिच्या सोबत आला होता या कामात तिला मदत करायला. 

टळटळीट दुपारची वेळ. आफ्रिकेतील ऊन ते. सगळीकडे धुरळा उठलेला. रस्त्यावर शेकडो लोक आहेत. त्यांच्या गर्दीत तिला ते मूल दिसलं…कसंबसं हालचाल करीत एक एक पाऊल पुढे टाकीत निघालेलं दिसेल त्या दिशेला. ती गाडीतून खाली उतरली. तिने त्या लोकांना विचारलं…कुणाचं मूल आहे? नाव काय याचं? कुणी याला खायला घातलंय की नाही गेल्या कित्येक दिवसांत? कुणाकडेही काहीही उत्तर नव्हतं. गेली आठ महिने अन्नान दशेत जगलेलं हे मूल…शरीर कसंबसं तग धरून होतं…..  तिने आपल्या हातातील बिस्कीटांपैकी एक बिस्कीट त्याच्या हातात दिलं…त्यानं ते लगेच घेतलं आणि तो अत्यंत हळूहळू आणि काळजीपूर्वक एक एक घास खाऊ लागला. तिने पाण्याची बाटली त्याच्या सुकलेल्या ओठांपाशी नेली. त्याने तिच्याकडे बघत बघत एक एक घोट पाणी प्यायला आरंभ केला. खपाटीला गेलेलं पोट..सर्व बरगड्या सताड उघड्या. दुस-याच क्षणी तिने निर्णय घेतला….या कुणाच्याही नसलेल्या बाळाला सोबत घेऊन  जायचं ! 

तिने त्याला कपड्यात गुंडाळलं अलगद. कारमध्ये बसली त्याला मांडीवर घेऊन. तिच्या नव-याने तिच्याकडे पाहिलं…त्याचे डोळे तिला जणू सांगत होते..हे बाळ काही फार दिवसांचं सोबती नाहीये! ती म्हणाली….मला आशा आहे हे जगू शकेल! आपण याचं नाव होप ठेऊयात का? हो,छान आहे…तो म्हणाला. आणि ते दोघं त्यांनी उभारलेल्या एका बालकाश्रमात आले. तिथं अशीच काही मुलं होती लोकांनी चेटकीण म्हणून हाकलून दिलेली…मारून टाकण्याचा प्रयत्न केलेली. 

माणसाला जगायला अन्न लागते,पण जीवनाला प्रेम,वात्सल्य गरजेचं असतं. मथुरेतून आलेल्या कन्हैय्याला यशोदेनं दूधही पाजलं आणि प्रेमामृतही…म्हणूनच कान्हा वाढला. या कृष्णवर्णीय बालकाला तिने आपल्या बालकाश्रमात आणून भरती केलं. जणू ते काल-परवाच जन्माला आलंय अशी त्याची काळजी घ्यायला सुरूवात केली…जणू त्याचं आयुष्य अठरा महिन्यांनी मागे गेलं होतं…नव्यानं आरंभ करण्यासाठी. 

तिच्या मनातील आशेने आता बाळसं धरायला प्रारंभ केला. साजेसं अन्न,स्वच्छता,निवारा आणि नि:स्वार्थ प्रेम या चार गोष्टींनी आपला परिणाम दाखवला काहीच दिवसांत….खुरटलेलं,रोगानं ग्रासलेलं,सुकलेलं हे मानवी रोपटं आता अंग धरू लागलं…..आता ते जिवंत राहण्याचं स्वप्न पाहू शकत होतं…आणि ते जगावं अशी तिला आशा होती….आणि तसं झालंच! त्या कुरूप वेड्या पिलाचं एका राजहंसात रूपांतर झालं! चेटकीणीचा शिक्का बसलेलं ते मूल आता देवदूतासारखं दिसू लागलं होतं! होप आता शाळेत जाऊ लागला आहे. (ही काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे…आता होप बराच मोठा झाला असेल.) 

तिचं नाव Anja Loven. यातील j चा उच्चार ‘य’ असा करायचा. अन्या लोवेन तिचं नाव. आडनावात तर Love आधीपासूनच असलेलं..जणू देवानंच दिलेलं नाव….. अन्या डेन्मार्क मध्ये जन्मलेली. पदवीधर. शिक्षणानंतर जग पाहण्यासाठी हिंडली. एका हवाई कंपनीत नोकरी केली काही दिवस. तिच्या आईला जीवघेणा कॅन्सर झाला म्हणून तिच्या सेवेसाठी ती घरीच राहिली…आई गेल्यानंतर तिने आपलं गाव सोडलं. एका कापड व्यवसायात व्यवस्थापकपदी पोहोचली. एका वर्षी सामाजिक कामाच्या निमित्ताने मालावी देशात जाऊन आली. टांझानियातील शाळांच्या मदतीसाठी तिने निधी जमवायला सुरूवात केली. २०१२ मध्ये अन्याने एक सामाजिक संस्था स्थापन केली. नायजेरीय सारख्या देशातील बालक-चेटकीण अंधश्रद्धेविषयी तिने ऐकलं आणि तिला ध्येय गवसलं…जवळचे सर्व विकून ती नायजेरीयात राहायला गेली…तिथे एक बालक संगोपन केंद्र काढलं जिथे अशा चेटकीण-बालकांना आसरा,शिक्षण दिलं जातं. नायजेरीयातील एका कायदेतज्ज्ञ माणसाशी, इम्यानुअल उमेम शी विवाह केला….त्यांना एक मुलगा आहे आता. अन्याने २०१५ मध्ये स्वत:ची जागा विकत घेऊन काम वाढवलं आणि लॅन्ड ऑफ होप चिल्ड्रेन्स सेंटर सुरू झालं. इथं आता शंभरच्या आसपास मुलं आहेत….चेटकीणींचं रूपांतर देवदूतात करण्याचा प्रयत्न सुरू आहे….कारण तिच्या मनात अखंडीत आशा आहे ! 

(इंटरनेटवरील प्रोजेक्ट नाईटफॉल पेजवरील एका विडीओमध्ये अन्याची गोष्ट पाहिली आणि तुम्हांला सांगावीशी वाटली. आपल्याकडेही सिंधुताई सपकाळांसारख्या माई होऊन गेल्या…त्यांची आठवण झाली यानिमित्ताने. अन्या म्हणते… HOPE means Help One Person Everyday!अन्याचं खरंच आहे…हे आपण करूच शकतो !)

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ चंद्रयान -३ ☆ श्री राजीव गजानन पुजारी ☆

श्री राजीव गजानन पुजारी

? इंद्रधनुष्य ?

☆ चंद्रयान -३ ☆ श्री राजीव गजानन पुजारी

चंद्राने माणसाला नक्की केव्हा भूल घातली हे सांगता येणे कठीण आहे. पण चंद्राशी अगदी ‘मामा’ चे नाते जोडण्यापासून ते त्याच्या शीतल चांदण्याच्या कौतुकापर्यंत आणि चंद्राशी जोडलेल्या अनेक धार्मिक संकेतांपर्यंत चंद्राने आपले भावविश्व् व्यापलेले आढळते.

माणसाने चंद्रावर पाऊल ठेवले त्याला चोपन्न वर्षे पूर्ण झाली. पण नील आर्मस्ट्रॉंगने प्रत्यक्ष पाऊल ठेवल्याच्या शंभर वर्षे आधी ज्युल्स व्हर्न नावाच्या विज्ञान लेखकाने त्याच्या ‘फ्रॉम अर्थ टू मून’ या विज्ञान कादंबरीत चंद्रयात्रेचे स्वप्न पाहिले होते.

भारताच्या चांद्रमोहिमांची सुरुवात चंद्रयान -१ पासून झाली. २२ ऑक्टोबर २००८ रोजी चंद्रयान-१ चे यशस्वी प्रक्षेपण करून इस्रोने चांद्रमोहिमांचा श्रीगणेशा केला. १४ नोव्हेंबर २००८ रोजी या यानाने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ‘इम्पॅक्ट प्रोब’ नामक उपकरण जाणूनबुजून आदळविले. या उपकरणामध्ये चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळील हवामान व तेथील भुपृष्ठ यांचा अभ्यास करणारी साधने होती. चंद्रवतरणाची ती एकप्रकारे नांदीच होती. याच मोहिमेद्वारा चंद्रावर गोठलेल्या अवस्थेत पाणी आहे हे सर्वप्रथम सिद्ध झाले.

२२ जुलै २०१९ रोजी आखलेल्या चंद्रयान-२ मोहिमेद्वारे इस्रोने चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ अलगद अवतरण करण्याचा प्रयत्न केला, पण कांही तांत्रिक अडचणींमुळे तो अयशस्वी झाला. मात्र त्याचा ऑर्बिटर त्यापूर्वीच चंद्रकक्षेत प्रस्थापित केला गेला होता. चंद्राचा अभ्यास करून मिळणारी माहिती पृथ्वीवर पाठविण्याचे काम हा ऑर्बिटर आजही चोखपणे करीत आहे. तसेच चंद्रयान -३ कडून मिळणाऱ्या माहितीचे प्रक्षेपण करण्यासाठी आपण हाच ऑर्बिटर वापरणार आहोत. त्यामुळे ही मोहिम सत्तर टक्क्यापर्यंत यशस्वी झाली असे इस्रोच्या शास्त्रज्ञांचे मत आहे.

याच मोहिमेचा पुढचा भाग म्हणून इस्रोने चंद्रयान – ३ मोहिमेचे नियोजन केले होते. १४ जुलै २०२३ रोजी प्रक्षेपीत केलेले चंद्रयान पृथ्वीभोवतालच्या कक्षा वाढवत चंद्राच्या कक्षेत प्रवेश करते झाले. चंद्राभोवती भ्रमण करतांना कक्षा कमी करत करत २३ ऑगस्ट २०२३ रोजी विक्रम लँडर चंद्रावर अलगद उतरले आणि भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ उतरणारा पहिला देश ठरला. त्यानंतर कांही वेळाने प्रज्ञान रोव्हर लँडर मधून बाहेर येऊन चंद्राच्या भुपृष्ठावर विहार करण्यास सज्ज झाला. हा रोव्हर चंद्रावर १४ पृथ्वी दिवस म्हणजेच एक चांद्र दिवस भ्रमण करून उतरलेल्या जागेभोवतालच्या चंद्राच्या भूपृष्ठाच्या मुलजैविक संरचनेचा अभ्यास दोन उपकरणांच्या सहाय्याने करेल व ती माहिती पृथ्वीकडे पाठवेल.

त्याचवेळी विक्रम लँडर त्याच्यावरील उपकरणांच्या सहाय्याने चंद्राच्या भूपृष्ठाची औष्मिक प्रवाहकता (thermal conductivity), तापमान, अवतरणाच्या जागेभोवतालची भूकंपशीलता (seismicity), चंद्राच्या भुपृष्ठाजवळील प्लाविकाची (plasma) घनता व त्याच्यातील फेरफार आणि चंद्राचे लेसर श्रेणीय अध्ययन आदि गोष्टींचा अभ्यास करून त्याची माहिती इस्रोकडे पाठवेल.

चंद्रयान -३ चे प्रॉपल्शन मॉड्युल पृथ्वीच्या वर्णक्रमिय (spectral) आणि ध्रुवमितीय (pilarimetric) मोजमापांचा अभ्यास करेल. या अभ्यासाचा वापर असूर्यवर्ती ग्रहांवर (exoplanets) जीवसृष्टी आहे का, हे पडताळण्यासाठी केला जाईल.

एकंदरीत चंद्रयान -३ मोहीम अत्यंत यशस्वी ठरली असून, त्याद्वारे भारत हा चंद्रावर उतरणारा चौथा देश ठरला आहे आणि ही आपणा भारतीयांसाठी अभिमानाची गोष्ट आहे.

© श्री राजीव गजानन पुजारी 

विश्रामबाग, सांगली

ईमेल – [email protected] मो. 9527547629

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ कॅप्टन  सचिन गोगटे – कॅडेट नंबर ३४५० ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

? इंद्रधनुष्य ?

☆ कॅप्टन  सचिन गोगटे – कॅडेट नंबर ३४५० ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

कॅप्टन सचिन गोगटे यांनी मर्चंट नेव्हीमध्ये अनेक वर्षं काम केलं. साध्या शिकाऊ कॅडेटपासून प्रचंड मोठ्या ऑइलटँकरचे कॅप्टन म्हणून अनेक वर्षं ते कार्यरत होते.  या कार्यकाळातील स्वानुभवांवर आधारीत लेखनातून त्यांनी आपल्याला या वेगळ्या क्षेत्राचा थरारक आणि सखोल परिचय करून दिला आहे.

मेकॅनिकल इंजिनिअर झाल्यावर सचिन यांनी ‘टीएस राजेंद्र’ या भारत सरकारच्या जहाजावर मर्चंट नेव्हीचे प्रशिक्षण घेतले. नंतर काही वर्षं व्यापारी जहाजांवर काम केले.डेक कॅडेटपासून सुरू झालेला त्यांचा जीवनप्रवास चाळीस वर्षं अव्याहत या क्षेत्रात सजगतेने काम करून  ऑइल टँकरचे तज्ज्ञ कॅप्टन या पदापर्यंत पोहोचला. अनेक परदेशी व्यापारी  जहाजांवर त्यांनी कॅप्टन म्हणून उत्कृष्ट काम केले.तसेच ऑइल टँकर व ऑइल फील्ड्स यातील तज्ज्ञ व्यक्ती म्हणून  जगभर नाव कमावले. कंपनीच्या विविध जहाजावर जाऊन तिथल्या उमेदवारांना प्रशिक्षण देण्यासाठी त्यांना आवर्जून बोलाविले जाई. त्यासाठी त्यांना  सततचा विमान प्रवास करावा लागला. त्यांनी जगातल्या १२० देशांना भेटी दिल्या. सहावेळा पृथ्वी प्रदक्षिणा घडली.

एखाद्या परदेशी बंदरात पोचल्यावर पाच सहा तासात तिथले व्यापार-व्यवहार समजून घेणे आणि त्याबद्दल बोटीवरील सहकाऱ्यांना व्यावहारिक प्रशिक्षण देणं त्यांनी महत्त्वाचं मानलं. जहाजाच्या आणि सहकाऱ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य दिलं.

इराण- इराक लढाई, अंगोला, सिरीया अशा युद्धक्षेत्रात  काम करताना जीवावरच्या प्रसंगांना तोंड द्यावं लागलं. समुद्री चाचेगिरीच्या प्रदेशात सुरक्षित राहणं ही फार महत्त्वाची गोष्ट असते. ही सुरक्षितता कशी मिळवावी याचं प्रशिक्षण देण्यासाठी त्यांनी अनेकदा सोमालीया, पश्चिम आफ्रिका, इंडोनेशियाच्या प्रदेशात जाऊन काम केलं. ऑइल टँकर्सवर काम करताना तिथल्या सुविधा वापरून जहाजांवरच्या मोठ्या आगींना तोंड देण्याचे प्रशिक्षण त्यांनी बारा वर्षे दिलं.

कॅप्टन सचिन यांनी आधुनिक विज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञानाचे अत्याधुनिक  शिक्षण घेऊन स्वतःला सतत काळाबरोबर ठेवलं. त्यामुळे ते अनेक जहाजांचे दूर संपर्काने (रिमोटली) जहाजाच्या ब्लॅक बॉक्सचं विश्लेषण करणे,नेव्हिगेशन ऑडिट करणे अशी कामे करू शकले.

या धाडसी क्षेत्रातला पैसा आपल्याला दिसतो पण त्यासाठी भरपूर शारीरिक, बौद्धिक आणि मानसिक कष्ट  करावे लागतात. सलग ३६ तास ड्युटी बऱ्याच वेळा करावी लागते. जमिनीचं दर्शनाही न होता अथांग सागरात अनेक दिवस काढावे लागतात. भर समुद्रात भयानक वादळांना तोंड द्यावे लागते.कुटुंबापासून महिनो महिने दूर राहावं लागतं. अनेकदा सचिन यांनी सागरी चाचेगिरीच्या संकटातून शक्तीने आणि युक्तीने जहाजाला सहीसलामत बाहेर काढले. कुठल्याही व्यापारी जहाजाचा किंवा ऑईलटँकरचा त्या त्या बंदरातील व्यवहार आपल्याला वाटतो तितका सरळ, साधा, सोपा कधीच नसतो. त्याला राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि दहशतवादाचे अनेक पैलू असतात.

सचिन  कॅप्टन असलेल्या सर्व जहाजांवर खूप कडक शिस्त स्वतःसह सर्वांनी पाळावी यासाठी ते  आग्रही असंत. तसेच सहकाऱ्यांच्या आरोग्याची, कुटुंबीयांची योग्य प्रकारे काळजी घेतली जाईल यावरही त्यांचे लक्ष असे .स्वतःच्या निर्व्यसनी, निर्भिड,धाडसी वागणुकीमुळे तसेच स्वच्छ चारित्र्यामुळे त्यांचा दरारा होता. बंदराला बोट लागल्यानंतर अनेक गैरव्यवहार  (बाई, बाटली, स्मगलिंग , अमली पदार्थ) होत असतात. सचिन यांनी कुणाकडूनही कसलीही भेट स्वीकारली नाही आणि स्वतःच्या जहाजावर कुठलाही गैरव्यवहार होऊ दिला नाही. यामुळे कंपनीचे वरिष्ठ अधिकारी त्यांच्यावर नेहमी खुश असत.

या त्यांच्या साऱ्या प्रवासात त्यांच्या पत्नी मीना यांनी मोलाची साथ दिली. लहानग्या ईशानसाठी आई आणि वडील दोघांची भूमिका समर्थपणे निभावली. निगुतीने संसार केला. सचिन यांना कसल्याही कौटुंबिक अडचणी न कळवता हसतमुखाने पाठिंबा दिला.ईशानचे शिक्षण आणि सर्व आर्थिक व्यवहार, नातेसंबंध उत्तम रीतीने सांभाळले. त्यावेळी आजच्यासारख्या मोबाइल ,इंटरनेट अशा कुठल्याही सोयीसुविधा नव्हत्या. जेव्हा कधी मीना यांना सचिन यांच्या जहाजावर जाण्याची संधी मिळाली तेव्हा लहानग्या ईशानसह सगळे आंतरराष्ट्रीय प्रवास एकटीने  करून ज्या बंदरात सचिन यांचे जहाज असेल ते बंदर गाठावे  लागे. जहाजावरही कॅप्टनची बायको म्हणून वेगळेपणाने न वागता मीना यांनी जेवणघरातील कूकपासून सर्वांशी सलोख्याचे संबंध ठेवले.

मीना यांना एकदा अशा प्रवासात एका भयानक प्रसंगाला तोंड द्यावे लागले. मीना यांना इजिप्तच्या कैरो या विमानतळावर पोहोचून तिथून प्रवासी गाडीने २२० किलोमीटर प्रवास करून अलेक्झांड्रिया या बंदरात सचिन यांची बोट गाठण्यासाठी जायचे होते. त्यांच्याबरोबर सचिन यांचे एक सहकारी होते. हा प्रवास थोडा आडवळणाचा आणि वाळवंटातील होता. वाटेत रानटी टोळ्यांची भीती असे. म्हणून काळोख व्हायच्या आत अलेक्झांड्रिया इथे पोहोचणे आवश्यक होते. परंतु विमानतळावरील एजंटच्या हलगर्जीपणामुळे प्रवास सुरू व्हायलाच संध्याकाळचे चार वाजले. थोडा प्रवास झाल्यावर ड्रायव्हरने त्यांना वाळवंटातील एका छोट्या हॉटेलमध्ये नेले व रात्र इथेच काढा असे सांगून तो पसार झाला. हॉटेलमधील त्या आडदांड परपुरुषांच्या वखवखलेल्या नजरा त्यांच्यावरून फिरत होत्या. धोका ओळखून त्यांनी  रूममधील सर्व फर्निचर ढकलत नेऊन दाराला टेकवून ठेवले. रात्रभर त्यांच्या दरवाजावर मोठ मोठ्या थापा मारल्या जात होत्या. पण मीना मुलाला कवटाळून गप्पपणे कॉटवर बसून होत्या. सकाळी उजाडल्यावर तो ड्रायव्हर आला आणि त्या कशाबशा अलेक्झांड्रियाला पोहोचल्या. संपर्काचे कुठलेही साधन नसल्यामुळे सचिन खूप काळजीत होते पण मीनाने विलक्षण धैर्याने साऱ्या प्रसंगाला तोंड दिले.

दैवगती खूप अनाकलनीय असते. सचिन एकदा कामासाठी तुर्कस्तानमध्ये इस्तंबूल इथे गेले होते. त्यांना रात्रीचं विमान पकडून सिंगापूर इथे जायचं होतं. संध्याकाळी काहीतरी खायला म्हणून ते रेल्वेस्टेशनकडे निघाले होते तेवढ्यात कानठळ्या बसवणारा स्फोटाचा आवाज आला आणि सचिन उलटे लांबवर फेकले गेले. त्यांच्या नाकातून कानातून रक्त वाहत होते अतिरेक अतिरेक्यांनी केलेल्या बॉम्बस्फोटचा त्यांना असा फटका बसला. कसबसे उठून त्यांनी विमानतळ गाठला. सिंगापूरला पोहोचले. पण तिथे गेल्यावर त्यांना चालायला खूप त्रास होऊ लागला. हालचालीवर बंधनं आली. त्या रोगाचे निदान एम एन डी (मोटर न्यूरॉन डिसीज) असे झाले. शरीरातील सर्व नर्व्हस सिस्टीम क्षीण होत गेली. कुटुंबीयांसोबत या आजाराबरोबर चार-पाच वर्षे झगडून सचिन यांनी या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या कर्तृत्वाला मनःपूर्वक नमस्कार 🙏

© सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print