मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ’गिली’ सूट ! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

गिली’ सूट ! ☆ श्री संभाजी बबन गायके 

त्या भयाण वाळवंटात नजर जाईल तिथवर फक्त क्षितिजाला स्पर्श करणारी तापली वाळूच दिसत होती. आणि याच वाळूत तो मागील सोळा तासांपासून पालथा पडून आहे. त्याचे डोळे मात्र त्याच्या रायफलच्या नळीवरल्या दुर्बिणीमधून सतत समोर काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करताहेत. पापणी लवण्याच्या दरम्यानचा काळही त्याला नकोसा आहे. त्याच्या समोर शंभरेक मीटर्स अंतरावर एक पडकी भिंत आहे. त्या भिंतीच्या पलीकडे काय याचा त्याला अंदाज नसला तरी भिंतीच्या शेजारी आडोशाला आपल्या सारखीच रायफल,आपल्यासारखीच दुर्बिण डोळ्यांना लावून कुणीतरी आपल्याकडेच पहात आहे गेल्या सोळा तासांपासून याची त्याला स्पष्ट जाणिव आहे. या सोळा तासांच्या मध्ये एक संपूर्ण रात्रही संपून गेली आहे. पण याला जराही हालचाल करण्याची परवानगी नाही…कारण जराशी हालचाल म्हणजे शरीराची हालचाल कायमची संपून जाण्याची नव्याण्णव पूर्णांक नव्याण्णव दशांश टक्के खात्री…बाकी एक दशांश म्हणजे नशीब! 

या गेल्या सोळा तासांमध्ये त्याच्या आजूबाजूला त्याचेच साथीदार असेच दूर कुठेतरी त्यांच्या त्यांच्या निशाण्यांकडे अक्षरश: डोळे लावून बसलेले असतीलही कदाचित. पण युद्धाच्या धुमश्चक्रीत इतकी चौकशी करीत बसायला वेळ आणि गरजही नव्हती म्हणा! याला एक लक्ष्य दिलं गेलं होतं…ते भेदायचं आणि पुन्हा शांतपणेच नव्हे तर अगदी पाषाणासारखं पडून रहायचं होतं..दुसरं लक्ष्य दिलं जाईल तोवर. 

भिंतीपाशी कुठलीही हालचाल नव्हती गेल्या सोळा तासांपासून. आणि हे तास आता वाढतच चालले होते बेटे! तसं त्याला प्रशिक्षण आणि सराव होता कित्येक तास खरं तर दिवस एकाच जागी लपून बसायचा..त्याला छद्मावरण म्हणतात. म्हणजे जिथे आपण आहोत तिथल्या जमिनीशी,मातीशी,झाडांशी पूर्णपणे एकरूप होऊन जायचं. झाडं तरी हलू डुलू शकतात….पण यांच्याबाबतीत हालचाल म्हणजे मृत्यूला मिठी…स्वत: होऊन मारलेली मिठी! 

असेच आणखी चार तास निघून गेले. कोण कशाला इतका वेळ लपून बसेल आपल्यावर गोळी डागायला? आणि तिकडून गोळी आलीच तर त्याचाच ठावठिकाणा नाही का लागणार आपल्या माणसांना? गोळी उडाली की ठिणगी उडतेच की…किमान धूर तरी दिसतोच दिसतो! शेवटी मनाचा खेळ! संयमाचा खेळ! जो हलला तो संपला या खेळात! आणखी साडेतीन तास गेले. एकूण साडेतेवीस तास उलटून गेलेत…हा खरा एलेव्हन्थ अवर सुरु आहे म्हणायचा. तो स्वत:शीच पुटपुटला आणि त्याने दुर्बिणीला लावलेले डोळे किंचित वर केले…त्याबरोबर त्याचे डोकेही अगदी एखाद्या इंचाने वर उचलले गेले…आणि…..थाड! एकच गोळी!…काम तमाम! 

हा आवाज ऐकून त्याच्या शेजारील वाळूतही हालचाली झाल्या….रायफली धडाडल्या…आता लपून राहण्यात काहीही हशील नव्हता! पण यावेळी समोरच्यांनी लढाई जिंकली होती…यांच्यापेक्षा जास्त वेळ स्तब्ध राहण्यात अंतिम यश मिळवून ! 

समोरासमोरची हातघाईची लढाई करण्याचे दिवस बंदुकांच्या शोधाने संपवून टाकले. लपून बसून अचानक गोळीबार करण्याचेही दिवस असताना छद्मावरण धारण करून प्रतिस्पर्ध्याला बेसावध गाठून यमसदनी धाडण्याची कला विकसित झाली….स्नायपर्स! या शब्दाचं स्पेलिंग स्निपर असा उच्चार करायला भाग पाडतं काहीजणांना. खरं तर इंग्रजी भाषेत एका अगदी लहान,चपळ पक्षाला स्नाईप हे नाव आहे. याची शिकार करणं खूपच अवघड. जरा कुठं हालचाल झाली का हा पक्षी प्रचंड वेगाने उडून जातो. आणि याची शिकार करणारे मग स्नायपर या नावाने ओळखले जाऊ लागले. 

युद्धात प्रतिस्पर्ध्याची अशा प्रकारे लपून शिकार करणा-यांना मग स्नायपर हे नाव पडले…१८२०च्या सुमाराचे हे वर्ष असावे. या प्रकारात अत्यंत दूर असलेल्या एकांड्या शत्रूला,त्याला दिसणार नाही अशा ठिकाणी लपून राहून गोळीने अचूक उडवणे हे स्नायपर्सचे काम. आणि इकडे स्नायपर असेल तर तो त्या विरुद्ध बाजूलाही असणारच. अशा स्थितीत जो आपले अस्तित्व शत्रूला जाणवू देणार नाही त्याची सरशी होणार,हे निश्चित. नव्या युद्धतंत्रात स्नायपरच्या जोडीला आणखी एकजण असतो..एकाने पहायचे…लक्ष्य निश्चित करायचे आणि दुस-याने रायफलचा ट्रिगर दाबायचा! हे तंत्र खूपच परिणामकारक आहे. सीमो हेह्या नावाचा फिनीश स्नायपर दुस-या महायुद्धात रशिया विरोधात लढला…याने पाचशेपेक्षा अधिक सैनिकांना एका एका गोळीत संपवून टाकल्याचा इतिहास आहे. 

आसपासच्या वातावरणाशी मेळ असणारे किंवा तसा भास करून देणारे छदमावरण तयार करणे,तशी वस्त्रे अंगावर घालणे याला कॅमॉफ्लॉज असा शब्द आहे..camouflage! 

 यात झाडांच्या फांद्या,पाने,गवत आणि तत्सम गोष्टी अंगावर घातल्या जातात आणि अंग झाकले जाते. तोंडाला विविध प्रकारचे रंग फासले जातात…जेणेकरून शरीर सभोवतालच्या वातावरणाशी एकरूप होऊन जावे. या प्रकारच्या वेशभूषेला “ गिली सूट (Ghillie Suit) “असे नाव आहे. गिली हे एका बहुदा काल्पनिक वन्य व्यक्तिरेखेचे नाव होते. तो अंगावर असेच गवत,पाने लेवून जंगलात फिरायचा…आणि त्याला लहान मुलांविषयी अत्यंत प्रेम असे. असो. 

तर भारतीय सैन्याने या कलेवर खूप आधीपासूनच पकड मिळवली आहे. कोणत्याही  वातावरणात,हवामानात आपले जवान एका जागी कित्येक तास आणि दिवसही स्थिर राहू शकतात. झाडांसारखे, दगडांसारखे निश्चल राहू शकतात आणि कित्येक मीटर्सवर असलेल्या दुश्मनाच्या मेंदूच्या चिंधड्या उडवू शकतात. महत्त्वाच्या व्यक्तींच्या हत्येसाठी जसा परदेशात असे स्नायपर कार्यरत असतात, तसे आपल्याकडे अशा व्यक्तींच्या सुरक्षिततेसाठीही स्नायपर्स असतात…फक्त ते सामान्य लोकांच्या नजरेस पडत नाहीत! 

स्नायपर म्हणून प्रशिक्षण घेणं खूप अवघड. यात शारीरिक,मानसिक कसोटी लागते. एकांतात इतका वेळ,एकाच स्थितीत पडून,लपून राहणे काही खायचे काम नाही. यात पुरुष सैनिक आजवर मक्तेदारी राखून होते. पण मागील दोनच महिन्यांपूर्वी या स्न्यापर्समध्ये एक महिला सामील झाली…तिने आठ आठवड्यांचे अत्यंत कठीण आणि आव्हानात्मक प्रशिक्षण प्राप्त केले आणि आज ही महिला सैनिक स्नायपर्सना प्रशिक्षण देणारी एकमेव महिला सैनिक बनली आहे. या आहेत सीमा सुरक्षा दलात अर्थात बी.एस.एफ.(बॉर्डर सिक्युरीटी फोर्स) मध्ये सब-इन्स्पेक्टर म्हणून सेवा करणाऱ्या सुमन कुमारी. त्यांच्या रायफलमधून ३२०० कि.मी.प्रति तास वेगाने लीलया गोळी सुटते आणि लक्ष्याचा अचूक वेध घेते…आणि गोळी चालवणारे हात जराही डळमळत नाहीत…गोळी कुठून आली हे कुणालाही समजत नाही. गिली सूट घालून या कुठे बसल्यातर अजिबात दिसून येत नाहीत…त्या स्वत: हलल्या तरच दिसतात! सुमनताईंचे वडील साधे इलेक्ट्रीशियन तर आई गृहिणी आहेत. हिमाचल प्रदेशातील मंडी या छोट्याशा खेड्यातून आलेल्या सुमन कुमारी २०२१ मध्ये बी.एस.एफ.मध्ये सब इन्स्पेक्टर म्हणून रुजू झाल्या आणि पंजाब मध्ये एका मोहिमेत एका तुकडीचे नेतृत्व करीत असताना त्यांना सीमेवरून अचूक गोळ्या डागणाऱ्या  शत्रूच्या स्नायपर्सच्या भेदक ताकदीचा अंदाज आणि अनुभव आला..आणि त्यांनी स्नायपर होण्याचा निश्चय केला. ५६ पुरुष सैनिकांच्या तुकडीत या एकट्या महिला होत्या. इंदोरच्या सेंट्रल स्कूल ऑफ वेपन्स अ‍ॅन्ड टॅक्टीक्स मध्ये त्यांनी आठ आठवड्याच्या प्रशिक्षणात अव्वल स्थान मिळवत इन्स्ट्रक्टर म्हणून दर्जा हासिल केला! 

सुमन कुमारींचा अभिमान वाटावा सर्वांना. इंग्रजीत असलेली ही माहिती जमेल तशी लिहून तुमच्यापर्यंत पोहोचवली..तुम्ही तुमच्या जवळच नका ठेवू. न जाणो आपल्यातल्या एखाद्या सुमनताईला स्फूर्ती मिळेल ! 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ सी. डी. ☆ श्री सुनील शिरवाडकर ☆

श्री सुनील शिरवाडकर

? इंद्रधनुष्य ? 

☆ “सी. डी.” ☆ श्री सुनील शिरवाडकर

दुपारची निरव शांतता..विस्तीर्ण हिरवळीवर दाट व्रुक्षांच्या छाया पडल्या आहेत.त्याला लागुनच ऐसपैस ग्रंथालय..त्याच्या ऊंचच ऊंच काचांच्या खिडक्या.. आणि त्या खिडक्यांजवळ असलेली टेबल्स,खुर्च्या. तेथे बसलेली एक एक अलौकिक व्यक्तीमत्वे.कधी अब्दुल कलाम.. कधी अम्रुता प्रीतम..कधी गुलजार.. तर कधी नरसिंहराव.

हो..अशी एक जागा आहे दिल्लीत.’इंडिया इंटरनैशनल सेंटर’. तेथे नजरेस पडतील फक्त आणि फक्त प्रतिभावंत. मग ती कुठल्याही क्षेत्रातील असो.

देशातील विविध क्षेत्रातील नामवंतांना म्हणजे शास्त्रज्ञ, साहित्यिक, कलावंत,पत्रकार, राजनितिज्ञ,विचारवंतांना  एकत्र येण्यासाठी.. विचार विनिमय करण्यासाठी एक जागा असावी ही मुळ कल्पना डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांची.हे असे केंद्र प्रत्यक्षात उभे करायचे तर त्यासाठी तश्याच उत्तुंग व्यक्तीमत्वाची गरज होती.

१९६० च्या आसपासची ही गोष्ट. संयुक्त महाराष्ट्र प्रकरणात वाद झाल्यामुळे डॉ.सी.डी.देशमुख मंत्रीमंडळातुन राजीनामा देऊन बाहेर पडले होते. पं.नेहरुंमध्ये आणि त्यांच्यामध्ये काही बाबतीत  मतभिन्नता जरुर होती.पण पं.नेहरु ‘सिडीं’ ची विद्वत्ता, योग्यता जाणुन होते. त्यांनी या प्रकल्पाची संपुर्ण जबाबदारी ‘सी.डीं. ‘ वर सोपवली. त्यांच्या सोबत होते जोसेफ स्टाईन…. एक अमेरिकन वास्तुविशारद. यांच्या विचारांवर..किंवा एकूणच व्यक्तीमत्वावर रवींद्रनाथ टागोरांचा प्रभाव होता.

सर्वप्रथम जागा निवड… नवी दिल्लीत लोधी गार्डन परीसर आहे. पाचशे वर्षांचा इतिहास असलेल्या या निसर्गरम्य परीसरातील जवळपास पाच एकराचा भूखंड निवडण्यात आला.बांधकाम सर्वस्वी वेगळ्या पद्धतीने करायचे ठरले. प्री फैब्रीकेटेड बांधकाम साहित्य आणि जोडीला ओबडधोबड दगड असा एक प्रयोग करण्यात आला. आणि हळुहळु सिडींना अभिप्रेत असलेली साधेपणात सौंदर्य शोधणारी वास्तु आकार घेऊ लागली.

प्रशस्त हिरवळीच्या पार्श्वभूमीवर असलेली ही देखणी वास्तू .. .प्रवेशद्वारापासूनच त्याचं वेगळेपण जाणवतं.आत प्रवेश केल्यानंतर डाव्या हाताला ग्रंथालय आणि सीडींच्या नावाचे भव्य सभागृह. सीडींना अभिप्रेत असलेली बौध्दिक सौंदर्य खुलवणारी ही वास्तू उभी करतांना कुठल्याही प्रकारची तडजोड करण्यात आली नाही.

पन्नास सदस्यांनी सुरुवात झालेल्या ‘आयसीसी’ चे आजची सदस्य संख्या सात हजारांपर्यंत पोहोचली आहे. येथील सदस्यत्व मिळणे तितकेसे सोपे नाही. मोठी वेटिंग लिस्ट असते. वर्षोनुवर्षे प्रतिक्षा केल्यानंतर योग्य व्यक्तीस तेथे सदस्यत्व बहाल केले जाते. पण तरीही केंद्रात सत्ता असलेल्या पक्षाच्या समर्थक व्यक्तीला तुलनेने प्राधान्य दिले जाते. आणि ते साहजिकच आहे.

येथील सदस्यसंख्या मोठी आहे.. पण त्यात स्वाभाविकच वयस्कर अधिक आहे. नवीन रक्ताला वाव मिळुन नवीन तंत्रज्ञान, आधुनिकीकरण व्हावे अशी भावना तेथील तरुण प्रतिभावंतांची आहे.

सध्या ‘आयसीसी’ अनेक उपक्रम सुरु आहेत.थिंक टँक.. चर्चासत्रे.. संमेलने..पुस्तक प्रकाशने हो आहेतच.लंच किंवा डिनर पार्टीच्या निमित्ताने विचार, कल्पनांची देवाणघेवाण होत असते.

साठ वर्षे उलटुन गेल्यानंतरही या वास्तुचे सौंदर्य तसुभरही कमी वाटत नाही. आजही राजधानीतीलच नव्हे तर देशातील बुध्दीमानांना आकर्षित करुन घेणारे हे ‘आयसीसी’..आणि त्याचे शिल्पकार आहेत डॉ.चिंतामणराव देशमुख. येथील प्रमुख सभागृहाला त्यांचे नाव देऊन त्यांच्या स्मृती चिरंतन ठेवण्यात आल्या आहेत.

यंदाचे वर्ष म्हणजे सीडींचे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जन्मवर्ष. बरोब्बर १२५ वर्षापुर्वी जन्म झालेल्या डॉ. चिंतामणराव देशमुख यांचे राजधानीत असलेले हे स्मारक समस्त मराठी जनांना अभिमानास्पद आहे यात शंका नाही.

© श्री सुनील शिरवाडकर

मो.९४२३९६८३०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ भल्यानें परमार्थीं भरावें… ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले

? इंद्रधनुष्य ?

☆ भल्याने परमार्थी भरावे… ☆  श्री संदीप रामचंद्र सुंकले 

भल्यानें परमार्थीं भरावें ।

शरीर सार्थक करावें ।

पूर्वजांस उद्धरावें ।

हरिभक्ती करूनी ॥

— समर्थ रामदास .

अर्थ :- चांगल्या माणसाने हा मनुष्यदेह परमार्थी लावावा व या नरदेहाचे सार्थक करून घ्यावे. त्याने भगवद्‌भक्ती करून स्वतःचा व पूर्वजांचाही उद्धार करून घ्यावा. 

प्रत्येक मात्यापित्याना आपली संतती निकोप निपजावी असे वाटणे स्वाभाविक आहे. यासाठी प्रत्येक आई बाप असो वा पालक असा प्रयत्न करीत असतो. एखाद्याच्या घरात एखादा मुलगा अथवा मुलगी जन्मास आली, पण उपजताच त्यामध्ये व्यंग असेल तर त्याचा आईबापाला आणि समाजाला काय लाभ ? उलट मनःस्तापच व्हायचा. आणिक एक कल्पना करू. मूल सदृढ आहे, हुशार आहे , पण वृत्तीने अगदीच तामसी आहे. काही वर्षांपूर्वी अमेरिकेत जोड मनोरे विमानाच्या धडकीने उद्ध्वस्त केले गेले. ते दोन्ही तरुण उच्च विद्या विभूषित होते, पण कुसंस्कार असल्याने, तामसी असल्याने त्यांनी स्वतःचा नाश केलाच पण अनेक कुटुंबाचा विध्वंस केला. अशी संतती आई बापाचा आणि कुळाचा कसा उद्धार करू शकेल….? याउलट, एखाद्या घरात मूल जन्माला आले ,कदाचित ते रूपवान नसेल, पण गुणवान असेल, शीलवान असेल, तर ते आपल्या आई बापाचा आणि कुळाचे नाव उज्ज्वल करू शकेल….! यापैकी कोणती संतती आपल्या घरी जन्माला यावी असे वाटते….? 

भारतीय इतिहासाचा अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल की सात्विकतेचे बीज एका जन्मात वृध्दींगत होत नाही. ती खूप मोठी प्रक्रिया आहे. रामाच्या कुळात अनेक पिढ्यांनी आधी आपल्या शुद्ध आचरणाने सात्विकतेचे बीज संवर्धित आणि सुसंस्कारित केले, त्याचे फळ म्हणून प्रभू श्रीरामांचे दिव्य चरित्र आपल्या समोर आले. समर्थ रामदासांच्या कुळात अनेक पिढ्या सूर्य उपासना होती. हे अनेक संतांच्या बाबतीत पाहायला मिळते. माउलींनी सात्विकतेचे बीज पेरले आणि यथावकाश त्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने फळ लाभले….! आपण यावर मूलभूत चिंतन करावे, आपल्याला अनेक गोष्टी आपसूक कळून येतील.

हे सर्व सविस्तरपणे सांगण्याचा हेतू हा की याचे महत्व वाचकांच्या मनावर बिंबायला हवे. आपल्या पूर्वजांनी आपले धार्मिक कुलाचार विपद स्थितीत सुध्दा टिकवले, पण चार इयत्ता शिक्षण जास्त झाल्याने लोकांनी कुलाचार आणि श्राद्ध पक्ष करणे बंद केले. माथी  टिळा लावायला आपल्याला लाज वाटू लागली, ….., अशा अनेक गोष्टी आहेत, पटतंय ना ?

महान तत्त्ववेत्ता रेने देकार्त म्हणतात, ” जुने कितीही सदोष वाटू लागले, तरी अगदी निर्दोष नवे हाती येइपर्यंत शहाण्याने हातच्या जुन्याचा त्याग करू नये. “ 

सर्व संतांनी सांगितले की हरि भक्ती करून आपला आणि आपल्या पूर्वजांचा उद्धार करता येतो किंवा उद्धार होत असतो….!आपण त्याच्यावर विश्वास ठेवत नाही. आपण एक उदाहरण पाहू. आधुनिक विज्ञानाच्या भाषेत सांगायचे झाल्यास असे सांगता येईल की जर एखाद्या हार्ड डिस्क वरील काही mb भाग currupt झाला तर पूर्ण हार्ड डिस्क खराब होते, निकामी होते. मनुष्याच्या मेंदूत किती gb ची हार्ड डिस्क भगवंताने बसवली आहे, याचे गणित मानवी बुध्दीच्या बाहेरचे आहे. त्याच्यावरील किती mb आपण  आपल्या दुर्बुद्धी ने currupt केल्या असतील, याचे आपल्याकडे मोजमाप नाही तरीही आपली हार्ड डिस्क बाद करीत नाही तर तो आपल्याला हार्ड डिस्क सुधारण्याची संधी मरेपर्यंत देत असतो. हा भगवंताचा आपल्यावरील सर्वात मोठा उपकार समजायला हवा. हे केवळ मनुष्य देहातच शक्य आहे. आपण यावर स्वतः चिंतन करावे.

असे म्हणता येईल की जेव्हा मनुष्य एकेक नाम घेत जातो, त्या प्रमाणात आपल्या मेंदूतील हार्ड डिस्क मधील एकेक bite शुद्ध होत जाते…

समर्थ आपल्याला हेच सांगतात की कोणत्याही मार्गाने मेंदूतील हार्ड डिस्क शुद्ध करून घ्यावी. आपल्या शरीरात ४६ गुण सूत्रे असतात. त्यातील २३ आई कडील आणि २३ बाबांकडील म्हणता येतील. मनुष्याने ब्रम्हाला जाणून घेतले तर त्याच्या आईकडील २१ आणि बाबांकडील २१ अशा एकूण ४२ पिढ्यांचा उद्धार होत असतो असे आपले धर्म शास्त्र सांगते. 

सर्व संत सांगतात की नर देहाचा मुख्य उपयोग शरीर उपभोगासाठी नसून भगवंताची प्राप्तीसाठी आहे. आपण तसा प्रयत्न करून पाहू.

जय जय रघुवीर समर्थ…

© श्री संदीप रामचंद्र सुंकले

थळ, अलिबाग. 

८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ज्ञानेश्वरीतील वसंतोत्सव… – लेखिका : सुश्री शालिनी लेले ☆ प्रस्तुती – सौ. मंजिरी येडूरकर ☆

सुश्री मंजिरी येडूरकर

? इंद्रधनुष्य ?

☆ ज्ञानेश्वरीतील वसंतोत्सव… – लेखिका : सुश्री शालिनी लेले ☆ प्रस्तुती – सौ. मंजिरी येडूरकर ☆

ज्ञानेश्वर कोमल मनाचे ज्ञानी संत. त्यांचे दृष्टांत व उपमा विशेष करून नेहमीच्या व्यवहारातील व निसर्गातील आहेत. आपण वसंत ऋतू म्हणजे निसर्गाशी निगडित म्हणतो. वसंत म्हणजे निसर्गाचे सौंदर्य, तेज, झाडावेलींची टवटवी, नवी पालवी, फळांचा बहर असा अर्थ घेतो. ज्ञानेश्वरांच्या दृष्टीने वसंताचा अर्थ जास्त व्यापक आहे. तो निसर्गापुरता मर्यादित नाही. निसर्ग त्यांना आवडतोच, वसंत ऋतूचा उल्लेख ते माधवी असा करतात. एकच वस्तू पाच ज्ञानेंद्रियांनी पाच प्रकारची दिसते, पाच प्रकारे तिचा अनुभव घेता येतो. तसाच एकाच वसंत ऋतुचा वीस दृष्टीने ज्ञानेश्वर विचार करतात. वसंत ऋतुच्या रूपागुणांचा जेथे जेथे उत्कर्ष तेथे तेथे त्यांना वसंत दिसतो. म्हणून हा वसंत दोन महिन्याच्या काळापुरता मर्यादित नाही.

व्यासांच्या बुद्धीच्या तेजात, प्रतिभेत ज्ञानेश्वरांना वसंत दिसला. त्यामुळे महाभारताला वैभव प्राप्त झाले. अर्जुनाला ते वसंत आणि कृष्णाला कोकिळ म्हणतात. कारण अर्जुनाला पाहून कृष्णरुपी कोकीळ बोलू लागला. गीताख्यान सुरू झाले. तसेच ज्ञानी पुरुषातही त्यांना वसंत दिसतो. कारण वसंताचा प्रवेश जसा झाडाच्या टवटवीवरून कळतो तसेच ज्ञानी पुरुषाचे ज्ञान त्यांच्या हालचालीतून, वागण्या बोलण्यातून प्रकट होते. सद्गुरूंमध्येही ज्ञानेश्वरांना वसंत दिसला. म्हणून ते सद्गुरूंना म्हणतात ‘माझी प्रज्ञा रुपी वेल्हाळ। काव्ये होय सुफळ।तो वसंत होय स्नेहाळ। शिरोमणी।(१४/२१) माझ्या बुद्धीरुपी वेलीला काव्यरूपी सुंदर फळ देणारे कृपाळू वसंत तुम्ही व्हा.चेतनेला ते शरीररुपी वनाचा वसंत म्हणतात कारण त्यामुळे मन बुद्धी प्रसन्न राहते.

योग्य काळाचे महत्व सांगताना ते म्हणतात, माळ्याने कितीही कष्ट केले तरी वसंत ऋतू येतो तेव्हाच फळे लागतात. माधवी जसे मनाला मोहित करते तसे दैवी माया म्हणजे मोहरुपी वनातील वसंतच, कामरुपी वेल वाढवते. योग्य अपेक्षेविषयी सांगताना ते म्हणतात, वसंत असला तरी आकाशाला फुले येत नाहीत. अनासक्ती आणि निरपेक्षतेचे उदाहरण म्हणजे वसंत. ‘का वसंतांचिया वहाणी।आलिया वनश्रीचिया अक्षौहिणी।  तेन करीतुची घेणी। निघाला तो।(१६/१६४) वनाच्या शोभेचे अनेक समुदाय आले तरी त्यांचा स्वीकार न करता वसंत निघून जातो. एवढेच नव्हे तर त्या फळाफुलांना, पालवीला हातही लावीत नाही. कर्मफलत्यागाचं हे उदाहरण!

वसंत ऋतूतील वाऱ्याला ते आईच्या प्रेमाची उपमा देतात. कारण त्याचा स्पर्श आईच्या प्रेमासारखा मऊ असतो.  वसंत ऋतू प्राप्त झाला असता झाडांना अकस्मात पालवी फुटते. कशी ते झाडानाही  कळत नाही आणि ती थांबवणे त्यांच्याही हातात नाही, स्वाधीन नाही. यातून भगवंताच्या स्मरणाने मी पणा कसा विसरतो हे दाखवून देतात. ‘वाचे बरवे कवित्व। कवित्वीं बरवें रसिकत्व। रसिकत्वी परतत्व। स्पर्श जैसा।'(१८/३४७ ) या आपल्या वचनाला आधार म्हणून ते वसंत ऋतूचे उदाहरण देतात. वसंत ऋतूतील अल्हाददायक बागेत प्रिय माणसाचा योग चांगला आणि त्यात इतर उपचारांची प्राप्ती व्हावी, तसाच वाचा, सुरस कवित्व आणि परमात्मतत्व यांचा संबंध. गीता आख्यानला तर ते भक्तरुपी वनातील वसंत म्हणतात .’वसंत तेथे वने।  वन तेथे सुमने। सुमनी पालींगने। सारंगाची। (१८/१६३५)वसंत तेथे वने, वन तेथे सुमने आणि सुमन तेथे भ्रमरांचे समुह.  याचाच अर्थ येथे श्रीकृष्ण तेथे लक्ष्मी आणि जेथे लक्ष्मी तेथे सिद्धी व भक्तांचे समुदाय.याचाच मतीतार्थ येथे कृष्ण व अर्जुन तेथे विजय व इतर सर्व भरभराट. हाच गीतेचा मतीतार्थ.

वसंतावरील शेवटच्या ओवीत ज्ञानेश्वर म्हणतात ‘नाना गुंफिली का मोकळी।उणी न होती परिमळी। वसंता गमीची वाटोळी। मोगरी जैसी।(१८/१७४०) वसंत ऋतूतील मोगरीची वाटोळी फुले, ओवलेली असो वा मोकळी, वासाच्या दृष्टीने त्यात कमी जास्त पणा नाही. त्याचप्रमाणे संस्कृत गीता आणि त्यावरील मराठी विस्तृत टीका दोन्ही शोभादायकच. दोन्ही मोगऱ्याचीच फुले,भाषारुपी वसंतातील!

एकंदरीत विचार करता गीतेतील तत्त्वज्ञानच या 20 ओव्यातून ज्ञानेश्वर सांगतात. वसंतांचा इतका विविधांगी विचार करणारे एकमेव ज्ञानेश्वरच. वसंत म्हणजे दोन महिन्याचा सृष्टी शोभा वाढवणारा कालावधी आहेच पण त्याच बरोबर वसंताचे कार्य करणारी व्यक्ती, वस्तू किंवा विचार म्हणजे वसंतच. म्हणून म्हणावे वाटते ज्ञानेश्वर रुपी वसंत या भारत वर्षात बहरला म्हणूनच गीतारूपी वनाची शोभा, जी ज्ञानेश्वरी, तिचा आस्वाद आपल्यासारख्या सामान्य भ्रमरांना घेता आला.

धन्य ते ज्ञानेश्वर आणि धन्य त्यांच्या ज्ञानेश्वरीतील वसंत!अशा या प्रतिभावंत ज्ञानेश्वरांना शतशः प्रणाम।

ज्ञानेश्वरीतील ओव्यांचे क्रमांक जेथे वसंताचा उल्लेख आहे.

१)१/४३, २)१०/१६९, ३)११/११३,४)१३/१३६, ५)१३/१७८, ६)१३/९९१, ७)१४/२१, ८)१४/२९५, ९)१६/१२६, १०)१६/१६४,

११)१६/१६९,१२)१८/१५ ,  १३)१८/११२, १४)१८/१२४,१५)१८/३४५,

१६)१८/१५१९, १७)१८/१६३५, १८)१८/१७४०, १९)११/३३७,२०)३/१००,२१)६/१४९.

लेखिका : सुश्री शालिनी लेले 

प्रस्तुती – सौ.मंजिरी येडूरकर

लेखिका व कवयित्री, मो – 9421096611

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ शापित गंधर्व आणि देवदूत ! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ शापित गंधर्व आणि देवदूत ! ☆ श्री संभाजी बबन गायके 

गायन-वादन कलांमध्ये अत्युत्कृष्ट श्रेणीचे कलाकार असलेले स्वर्गस्थ गंधर्व त्यांच्या हातून घडलेल्या काही प्रमादांमुळे मृत्यूलोकात पदावनत केले जातात,किंवा ते स्वत:च त्यांच्या काही कार्यासाठी खाली येतात आणि विविध रूपं धारण करतात, असं आपण ऐकत आलेलो आहोत.

पृथ्वीवर मराठी भाषेला लाभलेल्या बाल,छोटा,कुमार या गंधर्वांबद्दल आपण जाणतोच. 

देवांचा दिव्य परिचारक असणारा, तसेच अडचणीच्या प्रसंगी तातडीने येऊन उद्धार करणारा, त्यास देवदूत म्हणतात. जसे गंधर्व देवांचे तसेच देवदूतही देवांचेच! 

धारदार तरवारीसारखा लखलखता,पहाडी,भरदार आणि तरीही सुस्पष्ट  आवाज लाभलेला (आणि आता परलोकी गेलेला) असाच एक गंधर्व काही मराठी गाण्यांतून आपल्यासमोर साक्षात उभा राहतो….अजून आठवे ती रात्र पावसाची, अरूपास पाही रुपी तोच भाग्यवंत, अरे कोंडला कोंडला देव राऊळी कोंडला, कोण होतीस तू काय झालीस तू, घबाड मिळू दे मला, धरमशाळेचं देऊळ झालं…देव माणूस देवळात आला, क्षणोक्षणी रात्रंदिन तुला आठवीन आणि निसर्गराजा ऐक सांगतो! आणि अष्टविनायका तुझा महिमा कसा? विचारणारा कंठ म्हणजे चंद्रशेखर गाडगीळ! आणि त्यांनी, ‘कानाने बहिरा मुका परी नाही! हे मुंबई दूरदर्शनसाठी मूक-बधिर मुलांसंदर्भात गायलेलं गाणं कोण विसरेल? 

खुदा का बंदा असं विशेषण ज्यांना लाभलं ते स्वर्गीय महंमद रफी साहेब संगीताच्या क्षेत्रातच नव्हे तर प्रत्यक्ष व्यवहारातही देवदूतापेक्षा कमी नव्हते.

‘चंद्रशेखर’ गंधर्वाला ‘महंमद रफी’ नावाच्या देवदूताचा नकळत आशीर्वाद लाभला त्याचा हा किस्सा…अनेक ठिकाणी लिहिला गेला,सांगितला गेला. तो स्मरणरंजन म्हणून पुन्हा एकदा ऐकण्या,वाचण्यासारखा.

लेखक,दिग्दर्शक चेतन आनंद १९८० मध्ये कुदरत नावाचा हिंदी चित्रपट बनवत होते. मजरूह सुल्तानपुरी यांची गीते होती आणि संगीत देत होते राहूल देव बर्मन. परवीन सुल्ताना यांनी गायलेलं हमे तुमसे प्यार कितना हे गाणं तर कुदरतची ओळखच जणू. लतादीदी,किशोरदा,आशाताई,सुरेशजी वाडकर यांनी कुदरतची गाणी गायली. मात्र कुदरतचं शीर्षक गीत (टायटल सॉंग) कतील शिफई या कवींकडून लिहून घेतलं गेलं. शब्द होते…सुख दुख की हरेक माला कुदरतही पिरोती है! (आरंभी या गाण्याचे सुरूवातीचे शब्द वेगळे होते..नंतर गरजेनुसार त्यात बदल केला गेला!) हे गाणं महंमद रफीसाहेबांकडून गाऊन घ्यावं, असं चेतन आनंद यांचे मत होतं. आणि यावर दुमत असण्याचं कारण नव्हतं.  

राहुल देव बर्मन यांना मात्र या गाण्यासाठी चंद्रशेखर गाडगीळांचा आवाज चपखल बसेल असा विश्वास होता. त्यांनी सतत आग्रह करून चेतन आनंद यांना गाडगीळांच्या नावाला पसंती मिळवली. त्यानुसार त्यांनी चालही बांधायला घेतली होती. वादक,गायक,गीतकार अशा सर्वांच्या उपस्थितीत मुंबईत गाण्याचं काम सुरू होतं. या गाण्याची पहिली चाल आर.डीं.नी आधी अन्य एका चित्रपटात वापरली आहे हे आर.डी.ने चंद्रशेखर गाडगीळ यांच्या चेह-यावरील भाव पाहून ताडले होते. आणि मग मोठ्या त्वेषाने दुसरी चाल बांधली….! चंद्रशेखर यांच्या गळ्याला साजेल अशी. आणि चंद्रशेखर यांनीही या चालीला,शब्दांना सुरेल आणि पहाडी न्याय दिला! गाण्याचं ध्वनिमुद्रण करणा-या तंत्रज्ञांनाही हा नवा आवाज भावला होता. हिंदी चित्रपटसृष्टीत मंगेशकर,भोसले,वाडकर या मराठी नावांमध्ये आता गाडगीळ या आडनावाची भर पडणार होती…पण…कुठे तरी माशी शिंकली आणि चेतन आनंद यांनी या गाण्यासाठी महंमद रफी साहेबांना बोलवण्याचा आदेशच आर.डीं.ना दिला! हे समजल्यावर चंद्रशेखर गाडगीळ यांचा किती प्रचंड हिरमोड झाला असावा, हे रसिक समजू शकतात! 

रफी साहेब आले. आर.डीं.ना त्यांना चाल ऐकवली. गाडगीळ यांनी गायलेल्या चालीपेक्षा ही नवी चाल वेगळीच आणि काहीशी संथ,खालच्या पट्टीमधली होती. अर्थात रफी साहेबांनी या चालीला सुरेख वळण दिले. एकूण चार कडव्यांपैकी तीन कडव्यांचे ध्वनिमुद्रण पूर्ण झाले होते. चौथ्या कडव्याआधी रफीसाहेबांनी क्षणभर विश्रांती घ्यायचं ठरवलं. ते रेकॉर्डींग रूम मध्येच बसून होते. तिकडे स्टुडिओमधील तंत्रज्ञ आपापसात चर्चा करीत होते…तो आवाज रफीसाहेबांच्या मायक्रोफोनमधूनही ऐकू जात होता….कुणी तरी म्हणत होतं…हेच गाणं त्या पुण्याच्या दाढीवाल्यानंही खूप सुरेख गायलं होतं! हे शब्द रफीसाहेबांच्या कानांवर पडले आणि ते उभे राहिले!. त्यांनी ताबडतोब आर.डी.बर्मनला बोलावून घेतले….साहेबांसमोर कुणाची खोटं,अपुरं बोलण्याची छाती नव्हती….खरा प्रकार रफीसाहेबांना सांगितला गेला! 

  माझ्या हातून का एखाद्या नव्या गायकाचं भवितव्य उद्ध्वस्त करतोस? असं म्हणून रफी साहेबांनी मायक्रोफोन बाजूला ठेवला आणि ते स्टुडिओतून तडकाफडकी निघून गेले! एका अर्थाने शापित गंधर्वाच्या शिरावर एका देवदूतानेच वरदहस्त ठेवला होता! 

सुख दुख की हरेक माला हे गाणं तांत्रिकदृष्ट्या आता ख-या अर्थाने चंद्रशेखरगंधर्वाचं झालं होतं. हिंदी चित्रपट संगीताच्या आभाळात एक मराठी नाव चमकण्याची वाट मोकळी झाली होती. चेतन आनंद यांच्या आग्रहाखातर चित्रपटात रफीसाहेबांनीच म्हणलेली तीन कडवी ऐकवली गेली. मात्र चित्रपटाच्या गायक श्रेयनामावली मध्ये चंद्रशेखर गाडगीळ हेच नाव झळकले. एच.एम.व्ही. ने ध्वनिमुद्रीत केलेल्या ध्वनिमुद्रिकेसाठी आणि ध्वनिफीतीसाठी चंद्रशेखर गाडगीळ यांचाच आवाज घेतला गेला!.

पुढे हरजाई नावाच्या हिंदी चित्रपटात रफी साहेबांसोबत एका गाण्यात चंद्रशेखर गायले…तेरा नूर सितारों में…तेरा रंग बहारों में…हर जलवा तेरा जलवा…हो… मीरक्सम! हे गाण्याचे शब्द होते. त्यांनीच आरंभीचा आलाप घेतला होता आणि गाण्याची सुरूवातही आणि शेवटही केला होता! 

मात्र हिंदी चित्रपट सृष्टीतली स्पर्धा, आधीच सुस्थापित असलेल्या गायकांच्या आवाजाशी साधर्म्य अशा काही कारणांनी हा गंधर्व या मुख्य प्रवाहापासून काहीसा दूर पडला…हे या गंधर्वाचं प्राक्तन! असो. आर.डी.बर्मन यांनी चंद्रशेखर यांना नंतर काही गाणी दिली. पण चंद्रशेखर यांची हिंदीतली ठळक ओळख म्हणजे…सुख दुख की हरेक माला…कुदरत ही पिरोती है! सुख-दु:खाची माला ओवणारा निसर्ग,दैव त्याला हवी तशी माला गुंफतो! या मालेत चंद्रशेखर गाडगीळांसारखं वेगळं,टपोरं फुल दीर्घकाळ राहू शकलं नाही! एका दर्जेदार कलाकराच्या आयुष्यात हे बाब टोचणी लावणारी असते. चंद्रशेखर यांनी आपल्या आत्मचरित्राचं नावच मुळी ठेवलं होतं…शापित गंधर्व! प्रा.प्रज्ञा देशपांडे यांनी शब्दबद्ध केलेलं हे आत्माचरित्र प्रकाशित होण्याआधीच हा गंधर्व २०१४ मध्ये मृत्यूलोक सोडून निघून गेला ! 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ शब्दांची वादळं… ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? मनमंजुषेतून ?

☆ शब्दांची वादळं… ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

सुमारे चाळीस एक वर्षांपूर्वीची घटना आहे ही. आता मी जनसामान्यांबरोबरच साहित्यिकांमध्ये देखील प्रथितयश कवी म्हणून ओळखला जाऊ लागलो होतो. तरीही आपल्यापेक्षा ज्येष्ठ आणि श्रेष्ठ हे थोरच नाही का!

पुण्याच्या टिळक स्मारक मंदिरात कवी संमेलनात मी माझी ‘शब्दांची वादळं’ ही कविता सादर करायला व्यासपिठावर उभा होतो. मी पहिलाच चरण म्हटला,

‘शब्दांची अनेक वादळं आली, कधी तसा डगमगलो नाही’.

आणि अचानक माझ्या मागून, व्यासपिठाच्या मागील भागातून ‘वाः! सुंदर’ अशी दाद मिळाली.  मी चमकून, तरीही कृतज्ञतेने मागे वळून पाहिले; आणि काय सांगू तुम्हाला,  ही दाद मिळाली होती विंदा करंदीकर आणि मंगेश पाडगावकर या दोन ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कविवर्यांकडून! माझ्या अंगावर शहारे आले आणि मोठ्या उत्साहात मी ती संपूर्ण कविता सादर केली.  कवितेला टाळ्यांच्या कडकडाटाचा प्रतिसाद तर मिळालाच; शिवाय मेनका प्रकाशनच्या पु. वि. बेहेरे यांनी माझा दुसरा काव्यसंग्रह प्रकाशित करण्याची इच्छा प्रकट केली.  साहजिकच या काव्यसंग्रहाचे नाव आहे ‘शब्दांची वादळं’!

ही शब्दांची वादळं कविता: —-

शब्दांची अनेक वादळं आली कधी तसा डगमगलो नाही 

नजरांचे कुत्सित झेलले बाण विचलित असा झालोच नाही

आपण बरे आपले बरे ही वृत्ती कधी सोडली नाही

मार्ग आपला शोधत राहिलो कानावरचं मनावर घेतलंच नाही

नजर माझी वाईट म्हणत त्यांच्या वाटे गेलोच नाही 

नजरेसमोर आले त्यांना मात्र कधी टाळले नाही 

बोलणाराची वृत्तीच वाईट त्याचा बाऊ केलाच नाही

अनुभवाचे बसले चटके दुर्लक्ष करता आलं नाही 

*

अपयशाचा धनी झालो माझ्या,  त्यांच्या खोटं नाही

सावली माझी वैरीण झाली, शुभ तिला ठाऊक नाही 

नजर माझी अशुभ म्हणता सत्याला या पडदा नाही

दृष्टी माझी टाळून जाता मांगल्याला अडचण नाही 

भीती आता माझी मलाच अपयशाला वाण नाही 

नको आरसा म्हणून मला असली दृष्ट सोसवत नाही

© डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ तिसऱ्या स्फोटाच्या उंबरठ्यावर… – लेखक : श्री अच्युत गोडबोले ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

? इंद्रधनुष्य ?

☆ तिसऱ्या स्फोटाच्या उंबरठ्यावर… – लेखक : श्री अच्युत गोडबोले ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (AI) किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता काय करू शकते, याची चुणुक जगाला दिसू लागली आहे.

या तंत्रज्ञानाचे ‘गॉडफादर’ म्हणवले जाणारे डॉ. जेफ्री हिंटन यांनी त्याविषयीची भीती व्यक्त केली आहे. ‘एआय’ काय आहे, ते विनाशक का होऊ शकते याविषयी…

‘कृत्रिम बुद्धिमत्तेविषयी (एआय) मी जे काम केले, त्याबद्दल मला थोडा खेदच वाटतो,’ हे उद्गार आहेत ‘एआय’ तंत्रज्ञानाचे ‘गॉडफादर’ असे बिरूद लाभलेले डॉ. जेफ्री हिंटन यांचे.

‘‘एआय’, त्या तंत्राच्या भयावह शक्यता यांविषयी बोलताना नोकरीमध्ये असताना मर्यादा येतील, म्हणून राजीनामा देत आहे,’ असे त्यांनी ‘गूगल’ सोडताना सांगितले.

मी याला ‘तिसरा स्फोट’ म्हणतो. सन १८९६च्या आसपास ‘डायनामाइट’चा शोध लावणाऱ्या आल्फ्रेड नोबेलचा स्फोट पहिला. सन १९४५मध्ये ‘मॅनहॅटन प्रोजेक्ट’मधील अणुबॉम्बचा शोध लावणारा ओपेनहाइमरचा स्फोट दुसरा. आल्फ्रेड नोबेलच्या भावाचे निधन झाल्यानंतर, आल्फ्रेडचेच निधन झाले आहे असे समजून एका वृत्तपत्राने ‘मृत्यूच्या व्यापाऱ्याचे निधन’ अशी बातमी छापली.

आपण मेल्यावर जग आपल्याला कसे ओळखेल, आठवेल याविषयीची ‘याची देही याची डोळा’ जाणीव झाल्यानंतर उपरती झालेल्या आल्फ्रेडने, पापक्षालनासाठी ‘नोबेल पारितोषिका’ची घोषणा केली.

गंमत म्हणजे याच नोबेल पारितोषिकासाठी १९४६, १९५१, १९६७ असे तीन वेळा नामांकन मिळालेल्या; परंतु पुरस्कार मिळू न शकलेल्या रॉबर्ट ओपेनहाइमरने अणुबॉम्ब बनवला. त्याचा स्फोट ‘डायनामाइट’पेक्षा कित्येक पट विध्वंसक होता. त्यानंतर त्या संशोधनाच्या विनाशक शक्तीमुळे, ओपेनहाइमरने खेद व्यक्त केला होता.

आताचा डॉ. जेफ्री हिंटन यांचा राजीनामा आणि त्यानंतरची खेदयुक्त काळजी हा ‘एआय’ तंत्राच्या अजूनही अव्यक्त; पण नजीकच्या भविष्यातील महास्फोटाची जणू नांदीच!

इतकी वर्षे ‘गूगल’मध्ये कार्यरत असूनही, त्याने आत्ताच राजीनामा देण्याची मला तीन कारणे वाटतात. पहिले म्हणजे, ‘एआय’मुळे नजिकच्या काळात जवळजवळ ६० ते ८० टक्के नोकऱ्या कमी होण्याचे भाकित वर्तविले जात आहे; त्यामुळे प्रचंड सामाजिक अस्थैर्य निर्माण होईल. दुसरे म्हणजे, अलीकडेच ‘चॅट जीपीटी’ आणि ‘लार्ज लँग्वेज मॉडेल’ने (एलएलएम) घातलेला धुमाकूळ आणि तिसरे म्हणजे, या अत्यंत प्रगत ‘एआय’मुळे तयार होत असलेल्या विध्वंसक शस्त्रांची भीती.

‘स्वार्म तंत्रज्ञान’, म्हणजे अनेक छोटे ड्रोन एकत्रित काम करतात. एखाद्या व्यक्तीचे छायाचित्र दिल्यास हे सारे छोटे ड्रोन एकत्र काम करून त्या व्यक्तीला ठार करू शकतात. या हल्ल्यातून बचाव होणे शक्य नाही. ही तिन्ही कारणे ज्या तंत्रज्ञानामुळे शक्य झाली, त्यात डॉ. हिंटन यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे.

‘चॅट जीपीटी’ आणि ‘डीप फेक’ तंत्रज्ञानासारख्या गोष्टींमुळे सोशल मीडियावर बनावट छायाचित्रे, व्हिडिओ, मजकूर यांचा अनिर्बंध सुळसुळाट होण्याची नुसती शक्यताच नव्हे, तर अनेक शास्त्रज्ञांना खात्री वाटते. हे अत्यंत प्रगत तंत्रज्ञान वाईट हेतू असणाऱ्या, आसुरी महत्त्वाकांक्षेने प्रेरीत लोकांच्या हाती पडल्यास जगाचा विनाश अटळ आहे, याबाबतही त्यांच्यात एकवाक्यता आहे.

याच्याही पुढे जात, जगाचा विनाश ‘होईल का’, यापेक्षा ‘कधी होईल’ एवढेच विचारणे आपल्या हातात आहे, अशी भीतीही अनेक विचारवंत व्यक्त करीत आहेत. याच प्रकारची विधाने, काळजीयुक्त भाषणे अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक आणि प्रसिद्ध तंत्रज्ञ-उद्योजक इलॉन मस्क, बिल गेट्स करीत आहेत.

आपण ती ऐकत, वाचत आहोत. व्हाइट हाउसने नुकतेच ‘गूगल’चे सुंदर पिचाई आणि ‘मायक्रोसॉफ्ट’चे सत्या नाडेला यांना ‘एआय’चा जबाबदारीपूर्वक वापर व त्यासाठीचा आराखडा करणे यासंबंधी बोलावले होते. त्या बैठकीत ‘ओपन एआय’च्या (‘चॅट जीपीटी’ची जनक कंपनी) सॅम आल्टमनबरोबरच अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरिसही उपस्थित होत्या. ‘विश्वासार्ह एआय’साठी व्हाइट हाउसने १४ कोटी डॉलर जाहीर केले आहेत.

‘एआय’ची उपशाखा असणारी ‘न्यूरल नेटवर्क’ खूप जुनी आहे. ‘न्यूरल नेटवर्क’ अतिप्रगत करण्यात, तिचे २०१२मध्ये ‘डीप लर्निंग’मध्ये रूपांतर करण्यात डॉ. हिंटन यांचे मोलाचे योगदान आहे. या ‘डीप लर्निंग’ प्रकारामुळे आज ही परिस्थिती ओढावली आहे. डॉ. हिंटन म्हणतात, की हे तंत्रज्ञान मानवापेक्षाही पुढे जाईल, अशी शक्यता आहे आणि ती भयावह आहे.

काही दिवसांपूर्वी ‘सॅमसंग’ कंपनीने ‘चॅट जीपीटी’च्या वापरावर बंदी घातली. वॉरन बफे या गुंतवणूक क्षेत्रातील अग्रेसर सीईओने तर ‘एआय’ला ‘दुसरा अणुबॉम्ब’ म्हटले आहे. ‘एआय’ तंत्रज्ञानामुळे ६० ते ८० टक्के लोकांच्या हातचे काम जाईल, ते बेरोजगार होतील, याचा अनेक पाऊलखुणा दिसत आहेत.

‘रायटर्स गिल्ड’ या अमेरिकेतील लेखकांच्या संघटनेने नुकत्याच काढलेल्या मोर्चाने हे दाखवून दिले. ‘चॅट जीपीटी’ कथा, पटकथा लिहून देणार असेल, तर लेखकांना कोण मानधन देणार?

परवाचीच बातमी आहे, की ब्रिटनमध्ये गुंतवणूक तज्ज्ञांच्या सल्ल्यापेक्षा ‘चॅट जीपीटी’ने गुंतवणुकीवर अधिक परतावा दिला. ‘सोनी’च्या छायाचित्र स्पर्धेत प्रथम पारितोषिक जाहीर झालेल्या जर्मन छायाचित्रकाराने ते नम्रपणे नाकारले; कारण ती ‘एआय’ची कलाकृती होती.

‘एआय’, ‘बिग डेटा’, ‘क्लाउड’ इत्यादींचा समुच्चय असणारी, २०१३मध्ये अस्तित्वात आलेली चौथी औद्योगिक क्रांती म्हणजेच ‘इंडस्ट्री ४.०’ किंवा ‘आय ४’. याला मागे टाकत, दहा वर्षांत ‘इंडस्ट्री ५.०’ उदयाला आली आहे. यामध्ये मानव आणि यंत्र-तंत्र-रोबो एकत्र काम करतील. याला ‘कोबॉट’ म्हणतात. ‘कोबॉट’मुळे जीवन सुखावह (की आळशी?) झाले, तरी असंख्य नोकऱ्यांवर गदा येऊन, सामाजिक अस्थैर्य वाढेल.

प्रख्यात मानववंश शास्त्रज्ञ युवल हरारी (‘सेपियन्स’चा लेखक) याने एका ‘टेड टॉक’मध्ये म्हटले आहे, की ९० टक्के लोकांना भविष्यात काही कामच नसेल.

यावर काहीसा उपाय म्हणून बिल गेट्स यांनी ‘एआय एथिक्स ग्रुप’ सुचवला आहे. त्यांनी असेही म्हटले आहे, की एखाद्या उद्योगाने लोकांना काढून रोबोंना काम दिले, तर त्यांना ‘रोबो कर’ लावण्यात यावा.

‘एआय’वरील संशोधन सहा महिने थांबवावे, असे अनेक तंत्रज्ञ, शास्त्रज्ञ, विचारवंत सुचवत आहेत. तंत्रज्ञानाने केलेली कलाकृती वा काम आणि मानवाने केलेले काम यांत फरक करता आला नाही, तर त्याला ‘ट्युरिंग टेस्ट’ म्हणतात. ‘कोबॉट’ या ‘इंडस्ट्री ५.०’मधील तंत्रज्ञानात आपण तेथपर्यंत पोहोचलो आहोत. डॉ. जेफ्री हिंटन हे ‘ट्युरिंग पुरस्कार’ विजेते आहेत.

एवढे सामाजिक अस्थैर्य, विध्वंस होणार असेल, तर ‘एआय’ करायचेच कशाला, असा प्रश्न मनात उद्भवू शकतो. शेवटी ती मानवाचीच निर्मिती आहे. त्याचे उत्तर दडले आहे लोभीपणात.

‘एआय’ मध्ये काम करणाऱ्या कंपन्यांना त्यांच्या भागधारकांना उत्तम परतावा देऊन स्वत:ची तुंबडी भरायची आहे. जगात अस्थैर्य निर्माण होईल वगैरे तात्त्विक गोष्टींत त्यांना रस नसून, त्यांच्यात ‘एआय’मधील अग्रणी होण्याची उघडी-नागडी स्पर्धा आहे, हे नि:संशय.

या स्पर्धेत आपण टिकून राहण्यासाठी शिक्षणपद्धतीत शिक्षकांनी ‘गूगल’ व्हावे आणि विद्यार्थ्यांनी ‘चॅट जीपीटी’. म्हणजेच शिक्षकांनी ‘गूगल’पलीकडचे ज्ञान द्यावे आणि विद्यार्थ्यांनी ‘चॅट जीपीटी’चा वापर करावा; पण त्यावर पूर्ण अवलंबून न राहता स्वत:चा तरतम भाव वापरावा.

या पुढे आपली स्पर्धा ‘एआय’शी असणार आहेच; त्याहीपेक्षा ती ‘एआय’बरोबर काम करणाऱ्या मानवांशी अधिक असेल.

लेखक : अच्युत गोडबोले

प्रस्तुती : मंजुषा सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ कथा वक्तृत्वाची… ☆ श्री सुनील शिरवाडकर ☆

श्री सुनील शिरवाडकर

? इंद्रधनुष्य ? 

☆ “कथा वक्तृत्वाची” ☆ श्री सुनील शिरवाडकर

श्री. विश्वास नांगरे पाटील आणि प्रा. शिवाजीराव भोसले 

आपलं पहिलं वहीलं भाषण अनेकांना आठवत असतं. ते बहुतेक वेळा फसलेलं असतं. विश्वास नांगरे पाटील यांचं असंच एक पहिलं भाषण. प्राथमिक शाळेत होते ते.आणि प्रसंग होता टिळक जयंतीचा. व्यवस्थित पाठ केलेलं भाषण ऐनवेळी ते विसरून गेले. सुरुवात तर केली होती..पण पुढे आठवेना.

‘एवढं बोलुन मी माझे भाषण संपवतो’ असं म्हणुन त्यांनी जयहिंद केलं.नंतर त्यांना असं स्टेजवर उभं राहून बोलण्याची संधी मिळाली ती थेट कॉलेज मध्ये.

‘मला पडलेलं स्वप्न ‘ असा विषय दिला होता.सोमवारी ती स्पर्धा होती.आदल्या दिवशी त्यांनी एक चित्रपट बघितला होता..लालपरी नावाचा.एका गरीब मुलाला एक लालपरी भेटते.. त्याच्या आयुष्यातील अडचणी ती दुर करते..त्याची स्वप्न ती पुर्ण करते असं काही तरी ते कथानक होतं.

विश्वास नांगरे पाटलांनी कोणतीही तयारी न करता ते कथानकच अगदी समरसून सांगितलं. भाषणाला टाळ्या मिळवल्या.. पहिला नंबरही मिळाला.

अँकरींग करणे, किंवा आरजे यासाठी पण वक्तृत्व आवश्यक असतेच.कोणाला त्यात करीअर करायचे असते कोणी केवळ हौस म्हणून याकडे बघतात.पण एक उत्तम वक्ताच उत्तम ॲंकर होऊ शकतो.मग उत्तम वक्ता होण्यासाठी नेमकं काय करायला हवं?

” युवकांनी वक्ता होण्याची इच्छा जरूर बाळगावी.. पण त्यात अनिवार अधिरता नसावी.वक्तृत्व हे जोपासलेल्या व्यक्तीमत्वाला आलेले फळ असते.साधनेची सुदिर्घ वाट..आणि त्यानंतर शेवटी शेवटी येणारी प्रसिध्दीची पहाट ” —- हे विचार आहेत प्रा.शिवाजीराव भोसले यांचे. वक्तृत्व म्हणजे काय.. त्यासाठी नेमके काय करावे लागते.. मनाची,विचारांची मशागत कशी करावी,यांचं मार्गदर्शन शिवाजीराव भोसले करत असत.

वक्तृत्व आणि शिवाजीराव यांना आपण वेगळे करुच शकत नाही. ही कला त्यांनी कशी प्राप्त केली? त्यांनी विद्यार्थी दशेत असताना खूप भाषणे ऐकली.. त्यात श्री. म.माटे..बाळशास्त्री हरदास.. ना.सी.फडके..साने गुरुजी.. नंतरच्या काळात बाबासाहेब पुरंदरे.. इंदिरा गांधी.. वाजपेयी असे अनेक वक्ते होते. उत्तम वक्ता होण्यासाठी प्रथम उत्तम श्रोता होणे गरजेचे आहे. 

शिवाजीराव म्हणतात…. 

“एखादा वक्ता बोलण्यामुळे प्रसिध्दिस येतो.. पण तो ऐकण्यामुळे घडतो.. वाढतो हे आपण विसरून जातो. गायनात आणि वक्तृत्वात श्रवणाचे महत्त्व मानावेच लागेल. संगीत श्रवणाने कान तयार होतो, तर व्याख्यान ऐकून मन तयार होते. इतरांना काहीही ऐकवू पाहणाऱ्यांनी आरंभी खूप ऐकले पाहिजे. श्रवणाशिवाय आकलनाचे क्षितिज विस्तारत नाही.. बहुश्रुतपणा प्राप्त होत नाही.”

उत्तम वक्ता होण्यासाठी काय करावे हे जसे शिवाजीराव सांगतात.. तसे काय करु नये याचेही ते मार्गदर्शन करतात.दाद किंवा प्रतिसाद वक्त्याला हवाच असतो.. पण सुरुवातीला तो मिळण्याची शक्यता कमीच. शिवाजीराव सांगतात.. श्रोत्यांचे लक्ष विचारांकडे कमी आणि शब्दांकडे अधिक असते .त्यामुळे नवखा वक्ता चमकदार शब्दांचाच आश्रय घेतो.पण नंतर त्याला ती चटकच लागते. सुमार शब्दयोजना करून टाळ्या मिळवण्यात तो धन्यता मानतो आणि नंतर या पाशातून बाहेर पडणे त्याला अशक्य होते.

ज्यांना या क्षेत्रात करिअर करायचे आहे त्यांना शिवाजीराव सांगतात..

“ वक्तृत्व ही मनाच्या मळ्यात केलेली शब्दांची आणि विचारांची पेरणी असते.. रुजवण असते. जे अभ्यासपूर्वक आणि मनोभावे बोलत रहातात.. त्यांच्यावर वक्तृत्व लक्ष्मी प्रसन्न होते.” 

आपल्या पहिल्या..खरंतर दुसऱ्या भाषणात यश मिळाल्यावर  विश्वास नांगरे पाटलांचा आत्मविश्वास वाढला.त्यांनी ठरवलं..आता झाकली मूठ ठेवायची नाही. कोणत्याही स्पर्धेत उतरायचं .. .. भिडायचं  …लढायचं.. जिंकलो तर उत्तम, हरलो तर विचार मांडल्याचा आनंद व लढाईचा अनुभव तर कुठे जाणार नाही.

आणि हा आत्मविश्वास त्यांना मिळाला तो आपल्या बोलण्यातून….  आपल्या वक्तृत्वातून.

(१ जून – विश्वास नांगरे पाटील यांचा जन्मदिवस… .. त्या निमित्ताने…)

© श्री सुनील शिरवाडकर

मो.९४२३९६८३०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय ९ — राज विद्या राज गुह्यः योग — (श्लोक ११ ते २०) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय ९ — राज विद्या राज गुह्यः योग — (श्लोक ११ ते २०) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

संस्कृत श्लोक… 

अवजानन्ति मां मूढा मानुषीं तनुमाश्रितम्‌ ।

परं भावमजानन्तो मम भूतमहेश्वरम्‌ ॥११॥

*

मानवदेही मी अवतार मूढ मला न जाणत

मनुष्य जाणुनिया मजला ते मज अवमानित ॥११॥

*

मोघाशा मोघकर्माणो मोघज्ञाना विचेतसः ।

राक्षसीमासुरीं चैव प्रकृतिं मोहिनीं श्रिताः ॥१२॥

*

चित्तभ्रष्ट हे नर आचरित आसुरी अघोर जीवन

आशा व्यर्थ कर्मे निष्फल निरर्थक त्यांचे ज्ञान ॥१२॥

*

महात्मानस्तु मां पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रिताः ।

भजन्त्यनन्यमनसो ज्ञात्वा भूतादिमव्यम्‌ ॥१३॥

*

हे पार्था मोहमुक्त दैवी महदात्मा मज येती शरण

आदिस्थान मी अव्यय जाणुनी करिती माझे स्मरण ॥१३॥

*

सततं कीर्तयन्तो मां यतन्तश्च दृढ़व्रताः ।

नमस्यन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते ॥१४॥

*

दृढव्रत होउनि योगयुक्त राहुनी नित्य

कीर्तन करुनी वंदुनिया मलाच उपासत॥१४॥

*

ज्ञानयज्ञेन चाप्यन्ते यजन्तो मामुपासते ।

एकत्वेन पृथक्त्वेन बहुधा विश्वतोमुखम् ॥१५॥

*

कोणी भजती मजला एकत्वभावाने

कोणी जाणत मजला पृथक्भावाने

ज्ञानयज्ञे भजुनी मजला विविध भावाने

उपासना करिती माझी भक्तीभावाने ॥१५॥

*

अहं क्रतुरहं यज्ञः स्वधाहमहमौषधम्‌ ।

मंत्रोऽहमहमेवाज्यमहमग्निरहं हुतम्‌ ॥१६॥

*

वैदिक कर्मकाण्डाचा मी कर्ता पितरांचे तर्पण

ओखध मी घृत मंत्र मी आहुती मी मीच हुताशन ॥१६॥

*

पिताहमस्य जगतो माता धाता पितामहः ।

वेद्यं पवित्रमोङ्कार ऋक्साम यजुरेव च ॥१७॥

*

पिता मी अन् माता ही मी पितामह मीच 

पवित्र वेद्य ॐकार सर्व वेद आहे मीच ॥१७॥

*

गतिर्भर्ता प्रभुः साक्षी निवासः शरणं सुहृत्‌ ।

प्रभवः प्रलयः स्थानं निधानं बीजमव्ययम्‌ ॥१८॥

*

गती साक्षी ईश्वर निवास शरण सखा मीच

अव्यय बीज उत्पत्ती स्थिती निधन  प्रलय मीच ॥१८॥

*

तपाम्यहमहं वर्षं निगृह्‌णाम्युत्सृजामि च ।

अमृतं चैव मृत्युश्च सदसच्चाहमर्जुन ॥ १९॥

*

तप्त करूनीया जलासिया बाष्परूप देतो मी

पुनरपि त्यासी रूप अंबुचे पर्जन्ये वर्षवितो मी

सत्यरुपाने तत्व होउनी विश्वास व्यापितो मी

असत्य त्या सगुण स्वरूपे सर्वत्र वावरतो मी ॥१९॥

*

त्रैविद्या मां सोमपाः पूतपापायज्ञैरिष्ट्‍वा स्वर्गतिं प्रार्थयन्ते ।

ते पुण्यमासाद्य सुरेन्द्रलोकमश्नन्ति दिव्यान्दिवि देवभोगान्‌ ॥२०॥

*

त्रिवेदातील कर्म करूनी अर्चिती मज यज्ञाने

सोमप ते स्वर्गप्राप्ती कामना धरिताती मनाने

तयांस खचित होते प्राप्ती पावन इंद्रलोकाची

दिव्य भोग भोगण्या प्राप्ती तयांसी श्रेष्ठ द्युलोकाची ॥२०॥

अनुवादक : © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ पुनरावृत्तीचे सवाल !  ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

पुनरावृत्तीचे सवाल ! ☆ श्री संभाजी बबन गायके 

लोक ताटकळले होते. अशावेळी यावं लागतं, लोक रीत आहे. उद्या आपल्यावरही ही वेळ आहेच की. म्हणून लोक आले होते. किमान आपल्या बिरादरीतलं कुणी गेलं तर जावंच. कारण बिरादरीतलेच लोक काहीही करून हजर राहतात….निदान शेवटच्या वेळेला तरी!

गेलेला त्यांच्यात सर्वच बाजूंनी उजवा होता. त्याच्या शब्दांची सर यांच्या शब्दांना यायला आणखी चार दोन जन्म घ्यावे लागले असते कित्येकांना. मनातून अतीव दु:ख झालेले काही जण होतेच या जमावात, नाही असं नाही! पण ब-याच जणांना, किंबहुना सर्वांनाच घाई होती. आपण अंत्यविधीला उपस्थित होतो हे किमान चार दोन लोकांनी तरी पाहिले असले पाहिजेच असाच अनेकांचा प्रयत्न होता. त्यातील काहीजण तर स्मशानापर्यंत न येता रस्त्यातून मध्येच सटकून आपल्या कामाधंद्याला पळणार होते. कुणी गेलं म्हणजे व्यवहार का थांबून राहतो? नाही. व्यवहार करणारा थांबला की त्याच्या त्याच्यापुरता व्यवहार थांबतो. हे असंच चालतं जगात. 

पण दिवंगताची पत्नी पतीच्या शवापासून तसूभरही हलायला तयार नाहीत. त्या देहातून चैतन्य पुढच्या प्रवासाला कधीचंच निघून गेलेल्याला तसा आता बराच वेळ लोटून गेला आहे. आप्तांनी कर्तव्यभावनेने सारी तयारी कधीच पूर्ण केलीये. आता फक्त उचलायचं आणि चितेपर्यंत पोहोचवायचं…बस्स! 

बाईंनी त्यांच्या पतीचा, नव्हे त्यांच्या पतीच्या निष्प्राण देहाचे दोन्ही हात आपल्या हातात घट्ट धरून ठेवलेत. कुणी जाणता माणूस पुढे झाला. “वहिनी….जाऊ द्या दादांना…त्यांच्या प्रवासाला!” त्यावर बाई त्यांच्यावर एकाएकी बरसल्या. म्हणाल्या, “तुम्ही असाल मोठे कवी! पण तुम्हांला बाईच्या हृदयीची पीडा नाही समजणार!”

— तो बिचारा सभ्य सदगृहस्थ आधीच आपल्या परमप्रिय मित्राच्या देहावसानाने  भांबावून गेला होता. तो मागे सरकला. वहिनी त्याच्याशी बोलताना जणू आपल्या पतीच्या काही समजण्यापलीकडे निघून गेलेल्या निष्प्राण देहालाच प्रश्न विचारू लागल्या…बोलू लागल्या.

… “एकटेच आला होतात मला बघायला आणि माझ्या वडीलांकडे माझा हात मागायला. जातपात एकच आणि त्यात पगारी नोकरी. लेक सुखी राहील. बाप दुसरा कोणता विचार करतो? आणि बालविधवा मुलीचा बाप तर कशालाही तयार झाला असता…नव्हे अनेकांना हो सुद्धा म्हणून बसला होता. माझं पहिलं लग्न अकराव्या वर्षी झालं. कपाळावरचं कुंकू अजून माझ्या आणि इतरांच्याही सवयीचं होण्याआधीच,काळाच्याच भाषेत बोलायचं झालं तर, तीनेक एक महिन्यात पुसावं लागलं. कपाळावर कुंकवाचा मागमूसही राहिलेला नव्हता. आणि तुमचं लग्न तुमच्या पिताश्रींनी तुमच्या नकळत्या वयात लावून दिलं होतं. तुमची आई देवाघरी गेल्यावर तुमच्या वडिलांनी स्वत:च्या संसाराचा दुसरा डाव मांडलेला. तुम्ही आणि तुमची ती दुसरी आई. शंभरात नव्याण्णव जणांच्या नशिबी असलीच सावत्र आई येते…मानवी स्वभाव दुसरं काय? म्हणून मग तुम्हांला वडीलांनी लवकरच बोहल्यावर चढवलं होतं.

तुमची पत्नी तशी तुमच्यापेक्षा वयाने मोठी..खानदानी श्रीमंत…लाडावलेली….आई-वडिलांचा लळा अजून न सुटलेली. ती सारखी माहेरी जाण्याच्या तयारीत आणि मन:स्थितीत…बायकोच्या भूमिकेत असली तरी ती बालिकाच की.  लवकरच तुमचे वडीलही परलोकी गेले. तुम्ही बाहेरगावी शिक्षणासाठी असताना तुमच्या सावत्र आईत आणि पत्नीत काहीतरी कुरबूर झाली तर या सूनबाईंनी चक्क स्वत:चाच जीव घ्यायचा प्रयत्न केला. तुम्ही तिच्यावर रागावलात तर ती जी माहेरी गेली ती गेलीच.

आणि मग तुम्ही ठरवलंत…लग्न करायचं ते बालविधवेशीच. या विचाराला हिंमत लागते. ती तुम्ही दाखवलीत. अगदी वडीलांना आधी न विचारता तुम्ही माझ्या वडीलांना तुमची पसंती त्वरीत सांगितली होतीत आणि वडीलांनी दिलेली नाममात्र वरदक्षिणा स्विकारून विवाह निश्चितही करून टाकला. 

केवळ तुमच्यासाठी मी माझं वैधव्य खंडित केलं होतं….वैधव्याचा पदर माझ्या डोईवरून मागे घेतला होता….आणि कपाळी तुमच्या नावाचं कुंकू रेखलं होतं. आणि तुम्ही आता मला तोच पदर पुन्हा तोंड झाकण्यासाठी पुढे ओढून घ्यायला सांगताय….मी बरं ऐकेन? तुम्ही मला मागे टाकून एकटे जाऊच कसे शकता? तुमच्या कित्येक कथांमध्ये मी तुमच्याशी साधलेल्या संवादांचं प्रतिबिंब पाहून मला मनातून सुखावून जायला व्हायचं. तुमच्या लेखनावर कुणी केलेली टीका मला सहन व्हायची नाही. पण तुम्ही ती टीका मला मोठ्या चवीने वाचून दाखवायचात..! पण तुम्ही साहित्यनिर्मितीसाठी लिहीत नव्हताच मुळामध्ये…तुम्ही फक्त स्वत:ला व्यक्त करीत होतात…स्वत:ला मोकळं करीत होतात. तुम्ही भोगलेलं,अनुभवलेलं शब्दांच्या रूपांत पुस्तकांत जाऊन बसायचं….पानांपानांत दडून बसायचं! ” 

देह ऐकू शकत नव्हता आणि आता काही करूही शकत नव्हता. पण इतर जिवंत माणसांच्या काळजाला त्यांच्या या शब्दांनी घरं मात्र पडत चालली होती. सर्व उरकून घरी जाण्याच्या मन:स्थितीतली माणसंही आता मनातून वरमली असावी. सारेच स्तब्ध झाले होते! 

संवादामधला हा अवकाश जीवघेणाच असतो. पण त्यातूनही ते गृहस्थ दुस-या एकाला म्हणाले…बघ! तुला वहिनींना समजावता येतंय का ते!” आणि ते तेथून दोन पावलं मागे सरून खाली मान घालून उभे राहिले! 

बाईंचा विलाप हस्तनक्षत्रातल्या पावसासारखा घनघोर…अविरत.पण तरीही ही नवी जबाबदारी शिरावर अकस्मातपणे आलेला माणूस पुढे झाला….आणि अत्यंत कोमल स्वरांत म्हणाला….” ही तर केवळ माती उरलीये! या मातीत आता तुमचं माणूस उरलेलं नाही ! ”

…एक प्रदीर्घ हंबरडा उमटला आणि बाईंनी शवाच्या छातीवर टेकवलेलं आपलं मस्तक वर उचललं….त्यांच्या कपाळावरचं कुंकू सैरावैरा होऊन कपाळावरून उतरू लागलं होतं !

(हिंदी साहित्याच्या मालेतले मेरूमणि प्रेमचंद निवर्तले तेंव्हाचा हा प्रसंग. त्यांचे स्नेही आणि जीवलग कवी परिपूर्णानंद वर्मा यांनी ‘बीती यादें’ नावाच्या पुस्तकात वर्णन केला आहे. प्रेमचंद यांच्या अर्धांगिनी शिवरानी देवी पतीनिधनाने अति व्याकुळ झाल्या होत्या. प्रेमचंद यांचे सर्वात घनिष्ठ कवी मित्र जयशंकर ‘प्रसाद’ शिवरानी देवींना प्रेमचंद यांचे शव अंत्यविधीसाठी घेऊन जाण्याची विनंती करण्याचा प्रयत्न करीत असताना शिवरानी देवींनी दु:खावेगाच्या, अगतिक रागाच्या भरात ‘तुम्ही कवी असू शकता…पण एका स्त्रीचं हृदय तुम्हांला समजणार नाही’ असे उद्गार काढले होते. त्या प्रसंगाचं मी हे स्वैर भाषांतर आणि गांभिर्यपूर्वक स्वातंत्र्य घेऊन स्वैर रुपांतर केलं आहे. प्रेमचंद आणि त्यांच्या पत्नी शिवरानी देवी यांचं भावजीवन मूळातूनच वाचण्याजोगं आहे. असो. प्रेमचंद यांचे वर उल्लेखिलेले मित्र कवी,कथालेखक श्री. जयशंकर प्रसाद यांना कुणी या प्रसंगानंतर हसलेलं कुणी पाहिलं नाही..इतके ते आपल्या या मित्राच्या जाण्याने दु:खी झाले होते…त्यानंतर अवघ्या सहाच महिन्यांत तेही परलोकी गेले.. प्रेमचंद यांचे हिंदी साहित्य वाचकांच्या भावजीवनाचा एक अविभाज्य भाग आहेत हे तर निर्विवादच.) 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares