‘पृथ्वीवरचा स्वर्ग’ असे कोकणाचे वर्णन केले जाते. याच कोकणात सुंदर समुद्र किनाऱ्यांसह अनेक छुपी पर्यटनस्थळ आहेत. यापैकीच एक आहे चारही बाजूने पाण्याने वेढलेले छुपं गाव. इथं घराबाहेर होड्या पार्क केलेल्या असतात. रत्नागिरीतून राजापूर आणि मग जैतापूर असा बस प्रवास. यानंतर मग जैतापूरहून होडी किंवा बोटीतून जुवे गावात पोहचता येते. पर्यटन दृष्ट्या या गावाचा मोठ्या प्रमाणात विकास झालेला नाही. यामुळे हे ठिकाण पर्यटकांपासून अलिप्त आहे. नारळी पोफळीच्या बागा. मधोमध भुई आणि चहुबाजूंनी निळेशार पाणी. या गावचे निसर्ग सौंदर्य मन मोहून टाकणारे आहे. राजापूरची अर्जुना नदी अर्धचंद्राकृती आकार जिथे घेते तिथेच हे सुंदर ठिकाण आहे. चारही बाजूंनी समुद्रांनी वेढलेल्या या गावात जाण्यास होडी शिवाय पर्याय नाही. जैतापूर, बुरंबेवाडी, धाऊलवल्ली यांच्या मध्ये जैतापूर खाडीत जुवे हे गाव आहे. जैतापूर जवळ धाऊलवल्ली जवळ हे जुवे बेट आहे. कोकणातील या छुप्या बेटाचे नाव आहे जुवे बेट.
लेखक : अज्ञात
प्रस्तुती : श्री सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ हळद कुंकू लावून ओटी भरणारं उस्तादांचं घर… लेखक : श्री दीपक प्रभावळकर ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆
आता कलेला धर्मचौकटीत बांधणार काय?
उस्ताद झाकीर हुसेन गेले. त्यांना अनेकदा प्रत्यक्ष ऐकले, पण प्रत्यक्षात कधी भेटू शकलो नाही. अगदी कौटुंबिक जिव्हाळा आणि नाते असूनही !
कहाणीची सुरुवात होते, माझा मावसभाऊ संजूदादापासून. संजूदादाला लहानपणापासूनच तबल्याची नितांत आवड, सांगलीचा संजूदादा मिरजेच्या भानुदास बुवा गुरव यांच्याकडे तबला शिकत होता. तो साधारण 16 वर्षाचा असताना बुवांना देवाज्ञा झाली. आता संजूच्या तबल्याचे काय होणार, याची काळजी लागली. त्याचवेळी कोल्हापुरात झाकीरभाईंचा कार्यक्रम होता. आमची आत्या सुनंदा म्हणजे आमची ताईआत्या आणि संजूची थोरली बहीण सुहासिनी उर्फ आमच्या गोट्याताई हे संजूला घेऊन झाकीरभाईंना ऐकावायला गेले. सारं सभागृहत मंत्रमुग्ध झालं असलं तरी झाकीरभाइं&च्या बोटावर संजूदादाच्या काळजाचे ठोके नाचत होते. भाईंना ऐकून झालं. सारेच सांगलीला परतले.
इथं सुरु झाला प्रवास
तीनच दिवसात झाकीरभाई सांगलीत येणार होते. भाईंना ऐकून झालं होतं. आता त्यांच्याशी बोलायचं हे साऱ्या कुटुंबाने ठरवले आणि तुफान गर्दीत ते घडलेही. संजूदादाची ओळख करून दिली. जवाहिऱ्याला हिऱ्याची परख असते. चार मिनिटाच्या ओळखीत झाकीरभाइंनी तू मुंबईला ये आणि आब्बाजींकडे म्हणजे पंडित उस्ताद अल्लारखाँ यांच्याकडे शिक.
कला पूजा पूर्णत्वास आली…. दिवाळीत घरापुढे किल्ला करणाऱ्या पोराला अचानक हिमालयाच्या गिर्यारोहणाचे निमंत्रण मिळाल्यासारखंच होते.
अब्बाजी तुसी धन्य हो
संजूदादा आत्या आणि गोट्याताई मुंबईत घर शोधत शोधत भाईंच्या घरी पोहोचले. आता प्रश्न होता, संजूच्या मुंबईत राहण्याचा, ते आर्थिकदृष्ट्या अवघड होते. आब्बांनी एका वाक्यात तो सोडवला. अल्लारख्खांनी आपल्या आपर्टमेंटच्या पार्किंगच्या जागेत एक खोली बांधून संजूदादाच्या राहण्याची व्यवस्था केली. आणखीही तीन विद्यार्थी नव्हे नव्हे शिष्य तिथेच राहत होते.
झालं, संजूदादाचा तबला पुन्हा सुरू झाला. तुमचं काम, लगान गुरूकडे तुम्हाला घेऊन जाते, ते झालं. गुरूमंडळात आब्बाजींसाठी आणि झाकीरभाईंसाठी संजू आवडता झाला. झाकीरभाई अनेकादा दौऱ्यावर असत. झाकीरभाईंना आणखी दोन भाऊ आहेतच फजल आणि तोफीक तरी घरच्या अनेक जबाबदाऱ्या संजूवर आल्या होत्या. संजूदादा हा पंडीत उस्ताद अल्लारख्खाँ उर्फ आब्बाजींचा चौथा मुलगा होता. आब्बाजींचे पथ्य पाणी पाहणे, आम्माजी यांना हाताला धरून फिरवून आणणे हे संजूने स्वत:च सुरू केले. हे त्याला कुणी सांगितले नव्हते. घरच्या जबाबदाऱ्या कोणी दिल्या नव्हत्या, त्यान स्वत: घेतल्या होत्या.
संजूचे तबलाज्ञान हे सुद्धा इतकं वाढलं होतं की, मैफिलीला आब्बाजी त्याला सोबत घेऊन जात. आब्बाजींसोबत संगत करण्याचं अहोभाग्य संजूदादाला लहान वयातच लाभलं. अनेक मैफिलींना आब्बाजी संजूला एकटे पाठवत.
संजूचा तबला बघून झाकीरभाईंनी त्यांच्याच घरी शास्त्रोक्त पद्धतीने संजूचं ‘गंडाबंधन’ केले.
ब्राह्मणाची माऊली संजू घरी आनंदी
सांगलीच्या माझ्या आत्याला पोराची आठवण यायची. त्याकाळी सांगलीहून मुंबईला जायचे, लेकाला भेटायचे, पण रहायचे कुठे? हा प्रश्न असायचा. आत्या एकदा मुंबईला गेलीच, गॅरेजमध्ये लेकाला भेटल्यानंतर आम्माजींनी त्यांना वर बोलावून घरी राहायला सांगितले. आत्या झाकीर हुसेन यांच्या घरी एक दिवस नाहीतर चार दिवस राहून सांगलीला परतली. पुढे हा शिरस्ताच सुरू झाला. आत्या आठ आठ दिवस झाकीरभाईंच्या घरात राहायची.
संजूदादा झाकीरभाईंच्या घरातला अविभाज्य घटक होता. बाह्मणा घरचं पोरं मुसलमानाच्या घरात नांदत होतं. ठसठशीत पुंकू लावणारी आत्या आम्मीजींची अनेकदा सावली बनून राहत. गोट्याताई सुद्धा अनेकदा झाकीरभाईंच्या बहिणीसारखी त्यांच्या घरी राहत.
आम्हा घरी नाही धर्म आम्ही एकाची लेकरे
पुढे गोट्याताईचं लग्न झालं. भाऊजी सुनील आणि गोट्याताई गुजरातला निघाले होते. वाटेत संजूला भेटून जाऊन असं ठरवून ते संजूला भेटायला गेले. नेमके त्यादिवशी झाकीरभाई, आब्बाजी हे सारेच घरी होते. ताई-भाऊजी दोघांचा मुक्काम झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी निघण्याची गडबड असताना आम्माजींनी ताईला थांबवलं. पाटावर बसवलं आणि हळद कुंकू, अक्षदा (कुंकूमिश्रीत तांदूळ) लावून खणानारळानं तिची ओटी भरली. लेक जावायांनी साऱ्यांच्या पाया पडून ‘अष्टपूत्र सौभाग्यवती भव’ हे आशीर्वाद घेतले.
मी ढगाळ फाडतोय, मला ताकद द्या
ताई, भाऊजी गुजरातला पोहोचले, इकडं संजूदादाचं तबला करिअर बहरत होतं. दुर्देवाने संजूदादाला जाऊन काही वर्षे झालीत.
काल भाई पण गेले.. ,
अस्वस्थपणे हा सारा घटनाक्रम पाहताना रक्ताचे अश्रू वाहत होत. धर्मांधतेचे किटण चढलेले आपण जीणं जगतोय, कुठूनं आलं हे सगळं मळभ.
हिंदुस्थानावर कोसळू पाहत असलेला धर्मांधतेचा ढग माझ्या इवलाश्या हाताने काढण्याचा प्रयत्न करतोय. माझी ताकद कमी पडतेय, का कोणाच्या लक्षात येत नाही की आज आपण रंग, प्राणी सुद्धा धर्मामध्ये वाटले आहेत. कला सुद्धा रंगामध्ये बांधण्याचे प्रयत्न होत आहेत.
मुसलमानाच्या घरात बाह्मणाचा पोरगा जणू श्रीकृष्णाप्रमाणे वाढला. आणि मुस्लीम घरामध्ये हळद कुंकू, अक्षदा आणि नारळही असायचा. या साऱ्या घटनेचा परीसस्पर्श होऊन सुद्धा होऊनही मी सोनं का झालो नाही किंवा या विलक्षण घटनेचं परीस घेऊन समाजात मी सोनं का घडवू शकत नाही.
धर्मांमध्ये विभागणी करणाऱ्या लोकांच्या हातात कला लागू नये, आणि जे क्षेत्रे हाती लागली आहेत, त्यांना बाजूला करण्याचे बळ झाकीरभाईंच्या आत्म्याने द्यावे, हीच तुमच्या आमच्या ईश्वर आणि अल्लाकडे मागणी.
☆ पाढे… लेखक : श्री सुनील भातंब्रेकर ☆ प्रस्तुती व प्रतिक्रिया – श्री सुहास सोहोनी ☆
पूर्वीच्या काळी पाहुणे किंवा नातेवाईक वगैरे घरी आले की पढवून ठेवल्यासारखा एक प्रश्न हमखास विचारीत, ‘पाढे पाठ आहेत का रे?’ आपण ‘हो’ म्हटलं की ‘कितीपर्यंत?’ असा पुढचा प्रश्न! ‘पंधरा पर्यंत!!’ असं अभिमानाने सांगितलं की ‘तेराचा म्हणून दाखव पाहू!!’ तो कसाबसा अडखळत संपवला की ‘आता ‘चौदाचा म्हणून दाखव’ असा प्रश्नोपनिषादाचा पाढा चालू होई. कशी तरी सुटका करून घ्यावी लागत असे.
पाढे पाठ करायची एक सुंदर प्रथा का कोण जाणे मागे पडली. ‘बे एके बे’ पासून सुरु होणारे पाढे ‘तीस दाहे तीनशे’ पर्यंत म्हणता येणे ही हुशारीची – पाठांतराची परिसीमा होती. सर्वसाधारण मुलं ‘बारा’पर्यंत तरबेज असत. तेराला पहिली थोडी पडझड व्हायची. चौदा, पंधरा, सोळा हळूहळू का होईना ठीक जायचे. सतरा पासून अजून काही बुरुज ढासळायचे आणि एकोणीसला शरणागतीच्या पांढरे निशाण फडकावले जायचे. वीसला अर्थ नसायचा आणि एकवीसच्या पुढचे पाढे म्हणण्याची हिम्मत करणाऱ्याला लोकोत्तर मुलांमध्ये गणले जातात जात असे.
पण ते काही असो, बाकी सारे गणित विसरले तरी पाढे मात्र आयुष्यभर साथ देतात! ‘आठी साती छप्पन’, ‘बार चोक अठ्ठेचाळ’, ‘पाचा पाचा पंचवीस’ ह्या संथा एखाद्या गाण्याच्या लयीसारख्या मनात कोरल्या गेल्या आहेत. ‘भीमरूपी’ नंतर ‘महारुद्रा’ यावं किंवा ‘सुखकर्ता’ नंतर ‘दुःखहर्ता’ यावं इतक्या सहजतेने ‘चौदा सक’ नंतर ‘चौऱ्यांशी’ येई. मराठी शिकलेल्या एखाद्या मोठ्या कंपनीच्या चेअरमनच्या तोंडीही ‘अरे, सतरा लाखाला एक मशीन म्हणजे पाच मशीनचे – सतरा पाचा पंच्याऐंशी – म्हणजे एटी फाईव्ह लॅक्स होतील, ’ असा पाढा ऐकू आल्यास आश्चर्य वाटणार नाही.
आजकाल इंग्लिश पाढे म्हणतात, पण ‘फोर सिक्स जा ट्वेंटी फोर’ मध्ये ‘चार सक चोवीस’ची सहजता नाही. बाकी जाऊ द्या, पण कमीतकमी पाढे तरी मातृभाषेतच हवेत हे आमचं प्रामाणिक मत आहे. अहो, ते आकड्यांची श्लोक आहेत हो! त्यांना तरी इंग्रजीपासून सोडा ना! पूर्वीच्याही पूर्वी पाढे ‘तीस’पर्यंत थांबत नसत. पुढे दिडकी – अडीचकी – औटकी असे. हे म्हणणे डोक्यापेक्षा जिभेसाठी त्रासदायक होते. ‘बे ते दहा’ – छान पायवाट, ‘दहा ते वीस’ – दोनचार खड्डे वाला साधा रस्ता, ‘वीस ते तीस’ – प्रचंड खडबडीत रस्ता आणि दिडकीबिडकी म्हणजे केवळ दगडं अंथरलेला रस्ता, असा तो प्रवास असे.
जर कोणाला स्वतःचं बालपण आठवायचं असेल तर बाकी काही न करता बेशक पाढे म्हणा – बे एक बे, बे दुने चार, बे त्रिक सहा… क्षणात पोहोचता की नाही ही बघा बालपणीच्या रम्य दुनियेत!
या लेखावरील प्रतिक्रिया – – –
जुन्या आठवणींना उजाळा देणारा फार सुंदर लेख ! एका लयीत, एका सुरात, एका तालात एखादं समूहगीत म्हटलं जावं, तसंच पाढ्यांचं सुरेल गायन होतं असे. सवयीने, सरावानं, एकुणव्वदासे, त्रियोत्रिदोन, चवरोदरसे, बावनिदोन अशा अवघड शब्दांच्या सुद्धा नेमक्या संख्या कळत असत ! ती पाढ्यांची भाषा होती. तसे उच्चार करायला पण मजा वाटत असे. आताच्या काळांत आकलन, सुलभीकरणासाठी पाढ्यांतल्या संख्याही सरळसोट उच्चारल्या जातात, असं ऐकिवात आहे – नक्की माहित नाही. १ ते ३० पर्यंतचे पाढे आलेच पाहिजेत आणि रोज म्हटलेच पाहीजेत असा दंडकच होता. पुढे पुढे गणित, बीजगणित, भूमिती, क्ष+य, प्रमेय, साधन, सिद्धी, सिद्धता, रायडर्स, सूत्रे, गृहितके असे अनेक विषय विनाकारणच शिकलो असंच म्हणायला पाहिजे, कारण पुढच्या आयुष्यांत त्यांचं नांवही घेण्याची कधी वेळ आली नाही !… पण पाढे हा अपवाद !! ते पाठ असल्याचा फायदा पदोपदी अनुभवाला येतो. आजही फावल्या वेळात आठवतील त्या पाढ्यांचं गुंजन केलं, तर वेळ कसा जातो ते कळतंच नाही !
☆
लेखक : श्री सुनील भातंब्रेकर
लेख प्रस्तुती व प्रतिक्रिया : श्री सुहास सोहोनी
रत्नागिरी
मो ९४०३०९८११०
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ ‘पुणे… खूप खूप पूर्वीचे…’ लेखक : श्री दिगंबर देशपांडे – संग्राहक : अज्ञात ☆ प्रस्तुती– सौ. उज्ज्वला केळकर ☆
पेशवाईच्या काळात पुणे हे ओढे, नाले, गर्द झाडी, अरूंद रस्ते, गल्ली-बोळ, बखळी, असंख्य मोठ्या बागा, मोकळी सपाट मैदाने यांनी वेढलेले होते. सदाशिव पेठ हे एक खेडे होते. त्याचे नाव “मौजे नायगांव” असे होते. हा भाग “कारकोळपुरा” म्हणुन ओळखला जात असे. अनाथ विद्यार्थी गृह, नृसिंह मंदिर, खुन्या मुरलीधर हा परिसर कारकोळपुऱ्यात येतो. चिमाजीअप्पांचे पुत्र “सदाशिवरावभाऊ” यांच्या स्मरणार्थ माधवराव पेशव्यांनी या पेठेचे नाव सदाशिव पेठ असे ठेवले.
त्या वेळी पुण्यात मोठमोठे वाडे होते. बहुतेक वाड्यांतुन एखादे झाड, विहीर / आड असे. तांबड्या जोगेश्वरीचे मंदिर हे पुण्याच्या वेशीवर होते. तांबडी जोगेश्वरी, हुजुरपागा, तुळशीबाग, बेलबाग या समोरून एक ओढा वाहत होता. पुण्यात हिराबाग, सारसबाग, मोतीबाग, माणिकबाग, रमणबाग, कात्रज बाग, नातुबाग, विश्रामबाग, बेलबाग, तुळशीबाग या सारख्या मोठ्या आणि विस्तीर्ण बागांचे “साम्राज्य” होते. फुले मंडईजवळ खाजगीवाल्यांची चकले बाग होती. बहुतेक ठिकाणी पेरू आणि बोरांची झाडे होती. भवानी पेठेत बोरांच्या झाडांची दाटी असल्याने या भागाला बोरवन असे म्हणत. पूर्वी पुण्याच्या मध्यवर्ती भागात वड, पिंपळ, चिंच ही झाडे विपुल प्रमाणात होती.
सध्या पर्वतीच्या पायथ्याशी जो कॅनॉल वाहतो आहे, त्याच्या दोन्ही तीरांवर गर्द झाडी होती. तसेच द्राक्षांचे मळेही सगळीकडे होते. आंबा, केळी ही झाडे वाड्यातून असत.
तुळशीबागेत रामाच्या दर्शनासाठी जाण्यासाठी हिरवळीतुन पायवाट काढली होती. प्रभात रस्ता, डेक्कन जिमखाना या भागांत तर इमारती नव्हत्या. तेथे गवताच्या उंच गंजी होत्या. गायी म्हशींचे गोठे जागोजागी होते. सुरुवातीला शनिवारवाड्यासमोरील पटांगणात भाज्यांचा बाजार भरत असे. नंतरच्या काळात तेथे प्रवासी मोटार तळ झाला. चतु:श्रुंगीच्या मंदिर परिसरात घनदाट झाडी होती. विश्रामबागेच्या जागी हरिपंत फडक्यांची बाग, शनिपारापलीकडे नारोपंत चक्रदेवांची बाग, शिवाजी मंदिराच्या जागी सावकार गद्रे यांची बाग, पुणे विद्यार्थी गृहाच्या जागी सरदार रास्त्यांची बाग, त्याच्या अलीकडे नगरकरांची बाग अशी बागांची रेलचेल होती.
साधारण इ. स. १७००च्या आसपास पुण्याच्या आजुबाजूला मलकापुर, मुर्तजाबाद, शहापुर, शास्तापुर अशा छोट्या पेठा वसलेल्या होत्या. पुढे बाजीराव पेशव्यांनी मुर्तजाबादचे नाव बदलुन “शनिवार पेठ” असे ठेवले. शनिवार पेठेतल्या वीराच्या मारुतीच्या पुढे रस्ता नव्हता. इ. स. १७५३ मध्ये तळ्यातल्या गणपतीचे तळे नानासाहेब पेशव्यांनी मुद्दाम खणुन घेतले. या तळ्यातील पाण्यामुळे आजुबाजूच्या विहिरींना पाणी आले.
(सध्याच्या) टिळक स्मारक मंदिराच्या जागी पूर्वी पेशव्यांचा बंगला होता. त्याच्या आजुबाजुस मोठी बाग होती. या बागेला पाणी घालण्यासाठी विहीर खणली ती “खजिना विहीर” होय. नानासाहेब पेशव्यांनी १७५० साली हिराबाग बांधली. (येथे नाना साहेबांनी “मस्तानीला” नजर कैदेत ठेवले होते).
माती गणपतीच्या जागी सुद्धा घनदाट जंगल होते. मुठा नदीच्या किनारी असल्यामुळे तेथे मातीचे खूप ढिगारे होते. तेथे गुराखी, आपल्या गुरांना चारण्यासाठी आणत. हुजूरपागेच्या जागी घोड्यांची पागा / तबेले होते. नेहरू स्टेडियमच्या जागी तलाव होता. तो बुजवून तेथे स्टेडियम उभारले. (हल्लीच्या) लॉ कॉलेज रोडवरील फिल्म इन्स्टिट्यूटच्या जागी व्ही. शांतारामांचा “प्रभात स्टुडिओ” होता.
(“जुने पुणे आणि जुने वक्ते” या दिगंबर देशपांडे लिखित पुस्तकातुन साभार.)
लेखक : श्री दिगंबर देशपांडे
संग्राहक : अज्ञात
प्रस्तती : सौ. उज्ज्वला केळकर
संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३ सेक्टर – ५, सी. बी. डी. – नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र
स्टीफन हॉकिंग हा जगातला सर्वश्रेष्ठ वैज्ञानिक म्हणून मान्यता पावलेला, आइन्स्टाइनच्या पंक्तीला बसू शकेल असा माणूस. त्यात अगदी विशीतच मोटर न्यूरॉन डिसीज झाल्यामुळे व्हीलचेअरला खिळण्याची पाळी त्याच्यावर आली. या रोगात एकेका अवयवावरचा मेंदूचा ताबा नष्ट होत जातो. शेवटची चाळीसेक वर्ष त्याच्या मानेखालच्या सर्व अवयवांवरचा ताबा गेलेल्या आणि बोलताही येत नसलेल्या अवस्थेत तो जगला. म्हणजे, चालत्याबोलत्या सामान्य मनुष्यापासून ते जवळपास निव्वळ विचार करणारा मेंदू अशा शारीर ते बौद्धिक अवस्थेपर्यंत त्याचा प्रवास झाला.
अशा स्थित्यंतरातही त्याने देवाची करुणा न भाकता आपल्या वैचारिक वैभवाने विश्वरचनाशास्त्रातली, कृष्णविवरांची, काल-अवकाशाची कोडी सोडवली. त्याच्या अनेक नव्या उत्तरांनी नवीनच प्रश्नांची दालनं उघडली.
हॉकिंग हा स्वत: एक विश्वरचनाशास्त्रज्ञ (कॉस्मोलॉजिस्ट) होता. म्हणजे विश्वाची उत्पत्ती कशी झाली, त्याची रचना काय आहे, या प्रश्नांचा अभ्यास करणारा. या अभ्यासासाठी प्रथम जुन्या ताऱ्यांचा आणि तारकासमूहांचा अभ्यास करावा लागतो. अवकाशात जितकं खोलवर, दूरवर पाहावं तितके जुने तारे दिसतात. असं का होतं? याचं कारण म्हणजे प्रकाशाला प्रवास करायला वेळ लागतो. आपल्या पृथ्वीत आणि सूर्यात जे अंतर आहे, ते कापायला सुमारे आठ मिनिटांचा वेळ लागतो. त्यामुळे आपल्याला सूर्य दिसतो तो आठ मिनिटांपूर्वीचा. सगळ्यात जवळचा तारा सुमारे साडेचार प्रकाशवर्ष दूर आहे. म्हणजे त्याचा आपल्यापर्यंत पोहोचलेला प्रकाशकिरण हा तिथून साडेचार वर्षांपूर्वी निघालेला असतो. अवकाशाची व्याप्ती प्रचंड असल्यामुळे अब्जावधी प्रकाशवर्ष दूरचे तारे दिसतात. त्यामुळे जेवढे दूरचे तेवढे जुने!
१९२९ मध्ये या अभ्यासातून हबल नावाच्या शास्त्रज्ञाला हे लक्षात आलं, की सर्वच तारकासमूह एकमेकांपासून दूर जात आहेत. एखाद्या फुग्यावर ठिपके काढले आणि तो फुगवला तर सगळेच ठिपके आपल्या शेजारच्या ठिपक्यापासून दूर जाताना दिसतात, अगदी तसेच. जर तारकासमूह सतत दूर जात असतील, तर याचा अर्थ काही काळापूर्वी ते जवळजवळ होते आणि अजून पुरेसं मागे गेले, तर ते सगळेच एका बिंदूत एकवटलेले होते, असा निष्कर्ष निघतो. याचा अर्थ आपलं विश्व अनादी अनंत नसून एका क्षणी सुरू झालं! एका बिंदूपासून उगम होऊन गेल्या १३. ८ अब्ज वर्षांत इतकं महाकाय, प्रचंड झालं. याला ‘महास्फोटाचा सिद्धांत’ (बिग बँग थिअरी) म्हणतात. हे चित्र सामान्य माणसाचं डोकं चक्रावून टाकतं. कारण आपल्या डोळ्यांसमोर विश्वाची अनादी आणि अनंत अशी प्रतिमा ठसलेली असते.
विश्व निर्माण होण्याचा एक क्षण, एक बिंदू असेल तर साहजिकच प्रश्न पडतात- हे कोणी केलं? याआधी तिथे काय होतं? आपण इथे कसे आलो? यापुढे काय? हे विश्व असंच फुगत जाणार, की काही काळाने आकुंचन पावायला सुरुवात होत पुन्हा एका बिंदूत कोलमडणार? या प्रश्नांची हॉकिंगने उत्तरं देण्याचा प्रयत्न केलेला आहे.
सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे या विश्वाचा निर्माता देव आहे का? या प्रश्नाला इतरही उपप्रश्न चिकटलेले असतात. म्हणजे देवाची व्याख्या काय? देवाने हे विश्व निर्माण का केलं? देव मनुष्याच्या दैनंदिन जीवनात दखल घेतो का?… वगैरे वगैरे. या प्रश्नाचं उत्तर देताना हॉकिंग म्हणतो, ‘देव आहे की नाही, यावर मला काही भाष्य करायचं नाही. देव असलाच तर त्याने नक्की काय घडवलं, याबद्दल एक संदर्भचौकट मांडायची आहे. ’ यापुढे देवाबाबत हॉकिंगचं म्हणणं आहे की, ‘हे विश्व विशिष्ट नियमांनुसार चालतं. हे नियम अचल आहेत. ते कुठच्याही यंत्रणेमुळे बदलत नाहीत. कारण जे बदलू शकतात ते विज्ञानाचे मूलभूत नियम नसतात. त्यामुळे या अचल आणि सर्वासाठी सारख्या असलेल्या भौतिकीच्या नियमांनाच देव म्हणायचे असेल तर म्हणता येईल. ’ वर दिलेला ‘बिग बँग’चा संदर्भ देऊन हॉकिंग म्हणतो, ‘जेव्हा आपलं विश्व सुरू झालं तेव्हा अवकाश आणि काळही सुरू झाला. त्याआधी काही नव्हतंच. त्यामुळे शून्य काळाच्या आधी कोणीतरी निर्माता असणंही शक्य नाही. ’ हे स्पष्ट करण्यासाठी हॉकिंग उदाहरण देतो ते दक्षिण ध्रुवाचं. ‘तुम्ही दक्षिण ध्रुवावर पोहोचलात तर तिथून अजून दक्षिणेला काय असतं? ध्रुवाच्या व्याख्येपोटीच तिथून दिशा सुरू होतात. तिथून दक्षिणेला काही नसतं. तसंच ‘बिग बँगच्या क्षणाआधीचा क्षण’ असं काही नसतंच. ’
यापुढचा प्रश्न येतो तो म्हणजे शून्यातून विश्व कसं निर्माण झालं? हॉकिंग म्हणतो की, विश्व बनवण्यासाठी आपल्याला तीन गोष्टी लागतात. एक म्हणजे वस्तुमान- तारे आणि ग्रह बनवण्यासाठी; दुसरं म्हणजे ऊर्जा- सूर्यामध्ये ही भरपूर भरलेली हवी आणि तिसरं म्हणजे अवकाश- हे सगळे नांदण्यासाठी. आइन्स्टाइनने आपल्या सुप्रसिद्ध E = mc² समीकरणानुसार ऊर्जा आणि वस्तुमान एकच आहेत हे दाखवून दिलेलं आहे. याचा अर्थ, भरपूर ऊर्जा आणि अवकाश असेल तर आपल्याला नवीन सृष्टी बनवता येते. हे शून्यातून कसं निर्माण होतं? उत्तर सोपं आहे- नवीन अवकाश निर्माण करताना ऊर्जा मुक्त होते! अवकाशात धन आणि ऋण प्रकारच्या ऊर्जा असतात. (लक्षात ठेवा, सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा नसतात. ) त्यामुळे अवकाश आणि ऊर्जा दोन्ही मोठय़ा प्रमाणावर तयार झाले तरी त्यांची गोळाबेरीज शून्यच होते. एखादा मातीचा ढीग तयार करायचा असेल, तर नुसता ढीग तयार करण्यासाठी माती कुठून आणायची, हा प्रश्न उद्भवतो. मात्र, एक ढीग आणि एक तेवढाच खड्डा यासाठी मातीची गरज पडत नाही.
हे समजण्यासाठी ब्लॅकहोलच्या बाबतीतील माहिती आपण पाहूयात. समजा एक घड्याळ हे ब्लॅकहोलच्या जवळ जवळ नेत गेलो तर काय होईल? जसे जसे हे घड्याळ ब्लॅकहोलच्या जवळ जाईल तसे तसे त्याचा वेग हा कमी कमी होत जाईल आणि एक वेळ अशी येईल कि ज्या वेळी ते घड्याळ ब्लॅकहोल मध्ये पूर्ण आत गेलेले असेल आणि ते पूर्ण पणे थांबलेले असेल. ब्लॅकहोलमध्ये असं का घडतं, याचा ज्या वेळी अभ्यास करण्यात आला त्यावेळी शास्त्रज्ञाच्या लक्षांत आले की, ब्लॅकहोलमध्ये गुरुत्वाकर्षण शक्ती ही अनंत (Infinite) असते आणि त्यामुळे ती त्या घड्याळाला थांबवते, म्हणजेच वेळेला पण नष्ट करते. त्या ब्लॅकहोल मधून प्रकाशकिरणेही बाहेर जाऊ शकत नाहीत. कारण आत गेलेले प्रकाशकिरण हे ब्लॅकहोलच्या प्रचंड गुरुत्वाकर्षणामुळे बाहेर निघू शकत नाहीत. म्हणजेच प्रकाशकिरणे ब्लॅकहोलमध्ये गेल्यावर नष्ट होतात. कारण ब्लॅकहोलमध्ये गुरुत्वाकर्षण शक्ती अनंत असते. अगदी असेच Big Bang च्या वेळेस घडले. त्यामुळे जे लोक मला अश्या प्रकारच्या प्रश्न विचारतात की, ‘खरंच का हे विश्व देवाने बनविले आहे?’ तेव्हा या प्रश्नाचे उत्तर देताना मी त्यांना सांगतो की, ‘ह्या प्रश्नामध्येच काहीही अर्थ नाही. हे विश्व देवाने बनविलेले नाही. कारण वेळ, काळ, वस्तुमान ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळी निर्माण झाल्या त्याच क्षणी विश्वाची उप्पती झाली. म्हणूनच आपण म्हणतो की “We Got Everything from nothing”
‘बिग बँग’च्या वेळी विश्व जितकं लहान होतं तितक्या लहान पातळीवर अभ्यास करायचा झाला, तर आइन्स्टाइनच्या सामान्य सापेक्षतावादाची सांगड पुंजभौतिकीशी घालावी लागते. शून्यमय अवकाशात एकवटणाऱ्या वस्तुमानाचा आणि तिथे घडणाऱ्या घटनांचा अभ्यास करताना ‘सिंग्युलॅरिटी’ नावाची संकल्पना विचारात घ्यावी लागते. याचं कारण तिथली घनता अमर्याद वाढत जाते. अशा अनंताशी खेळत तिथली गणितं सोडवावी लागतात. हॉकिंगने कृष्णविवरांचा सखोल अभ्यास केला होता. कृष्णविवरांच्या केंद्रातही महाप्रचंड वस्तुमान एकवटलेलं असल्यामुळे तिथेही सिंग्युलॅरिटी तयार होते. म्हणूनच तो म्हणतो, विश्वाची उत्पत्ती- काळ, वस्तुमान, ऊर्जा आणि अवकाश या सगळ्यांचीच सुरुवात ‘बिग बँग’ने झाली. त्याचा निर्माता देव नक्कीच नाही… आहेत ते भौतिकशास्त्राचे अचल नियम. विश्वाच्या निर्मितीचे रहस्य समजून घेण्यासाठी ईश्वराची आवश्यकता नाही. महास्फोट हा केवळ भौतिक विज्ञानाच्या नियमांचा परिणाम आहे. सापेक्षतावाद आणि पुंजवाद यांच्या आधारे विश्वाची निर्मिती कशी शून्यातून होऊ शकते हे समजून घेता येते.
डार्विनच्या सिद्धांतामुळे ईश्वराला जीवशास्त्राच्या परिघाबाहेर करण्यात आले. ईश्वर नाही असे जरी कोणी सिद्ध करू शकले नाही तरी विज्ञानामुळे ईश्वर नामक संकल्पना आनावश्यक बनते हेही तितकेच खरे. म्हणूनच विज्ञान हाच ज्ञान मिळवण्याचा एकमेव मार्ग आहे आणि शेवटी त्या मार्गावरूनच आपल्याला विश्वाच्या नियमांचे परिपूर्ण ज्ञान मिळू शकेल, असे स्टीफन हॉकिंग यांना ठामपणे वाटत होते.
☆ ‘चो-ला’ ची चकमक… – लेखक : जयंत कुलकर्णी ☆ प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनवणे ☆
सिक्कीममधे १९६५ सालातील सप्टेंबर महिन्यात ७/११ ग्रेनेडियर्स (गुरखा रायफल्स) च्या बटालियनला हुश्शार राहण्याच्या सूचना देण्यात आल्या. कारण होते चिनी सैन्याने आपल्या काही भूभागावर हक्क सांगून तेथील चौक्या हटवायचा निर्वाणीचा दिलेला इशारा.
७/११ ग्रे. आणि १० जम्मू-काश्मिर रायफल्सच्या एका बटालियनने ४७२० मीटर उंचीवर मोर्चा संभाळला होता. दोन वर्षे असेच चालले होते. किरकोळ कुरबूरींशिवाय काही घडले नाही.
अचानक ११ सप्टेंबर १९६७ रोजी नथूला खिंडीचे प्रकरण झाले. गंगटोकच्या रस्त्यांचे संरक्षण करण्यासाठी ७/११ ने रातोरात योग्य जागा बघून आपल्या चौक्या उभ्या केल्या. नथूलाच्या चकमकी थांबल्या आणि ७/११ च्या वाढदिवसानिमीत्त त्यांची जागा १० जे-के रायफल्सला देण्याचे आदेश आले.
२८ तारखेला आपली संदेशवहनाची सामूग्री, तोफा इ. घेऊन १०-जेके ने आपली जागा सोडली व आघाडीचा रस्ता पकडला. संदेशवहनाची यंत्रणा, चो खिंडीच्या पश्चिम-दक्षिण दिशेला दोन झोपड्या होत्या, त्या ठिकाणी उभी करायची योजना होती.
चो खिंडीत एक तोफ, तर दोन पलटणींनी १५१८१ नंबर ची चौकी गाठायची आणि तेथील ११-ग्रेनेडस् च्या सैनिकांना परत पाठवायचे, असे ठरले होते.
डी. कंपनीच्या दोन पलटणींनी १५४५० नंबरची चौकी, जी पश्चिमेला होती, तेथे संरक्षणाची जबाबदारी स्विकारली होती. उरलेल्या दोन पलटणींपैकी एक रायगाप येथे, तर एक ताम्झेच्या पिछाडीला अशी कामाची वाटणी झाली. या पलटणीबरोबर एक उखळी तोफांची तुकडी ठेवण्यात आली.
एक दिवस अगोदर १० जेकेच्या काही शिख जवानांची चिनी सैनिकांशी एका छोट्या जमिनीच्या तुकड्यावरून बाचाबाची झाली होती. किती मोठा तुकडा असेल हा ? फक्त अंदाजे ५ मीटर लांबीचा हा तुकडा होता.
सीमेवर वातावरण हे असे असते आणि ते तसेच ठेवावे लागते. ‘अरे’ ला ‘कारे’ विचारल्याशिवाय शत्रूही आपला आब राखत नाही. ते जगच वेगळे असते. आपल्याला येथे वाचून त्याची खरीखुरी कल्पना यायची नाही.
तर या तुकड्यावर एक खडक होता आणि त्यावरून त्यांची जुंपली होती. हा तुकडा ना त्यांच्या हद्दीत होता ना आपल्या. या तुकड्याच्या मध्यभागी एक पांढरी रेषा अस्पष्टशी दिसत होती.
या खडकाच्या दोन्ही बाजूला दोन्ही देशाचे तीन तीन सैनिक पहारा देत उभे रहात असत. या सैनिकांमध्ये साधारणत: दोन एक मीटर अंतर राखले जाते. कारण नुसता एकामेकांचा धक्का जरी चुकून लागला तरी १०-१५ जणांचे प्राण सहज जाऊ शकतात. विस्तवाशीच खेळ ! कारण बंदूकीच्या चापावर कायमच बोट आवळलेले असते.
या भांडणात जी वादावादी झाली त्यात एका चिनी सैनिकाला मारण्यात आले आणि त्याच्या कोटाचे बटण तुटले. हे झाल्यावर ते चिनी सैनिक परत गेले आणि दैनंदिन कार्यक्रम परत चालू झाला.
हे झाले पण याची खबरबात मेजर जोशी, जे या कंपनीचे प्रमुख होते, त्यांना फार उशिरा कळवण्यात आली. ३० सप्टेंबरला त्या दोन झोपड्यांच्या तळावर पोहोचल्यावर मेजर जोशींनी त्यांच्या दोन कंपन्यांनी आघाडीवर चौक्या प्रस्थापित केल्या आणि ते १५४५० कडे निघाले.
लेफ्टनंट राठोड यांना त्यांनी तशी कल्पना दिली की ते साधारणत: दुसर्या दिवशी, म्हणजे १ ऑक्टोबरला सकाळी साडेनऊला तेथे पोहोचतील.
मेजर जोशी मधे वाटेत लागणार्या राईगापला पोहोचले. या येथून १५५४० ची चौकी दिसत होती. वरून त्या दिशेला पहात असताना त्यांना दिसले की चिनी सैनिकांच्य़ा एका तुकडीने त्या चौकीला घेरण्याचे प्रयत्न चालवलेले आहेत आणि एक तुकडी डी कंपनी जेथे तैनात होती, त्या दिशेला जाताना दिसली.
मेजर जोशींनी लेफ्टनंट राठोड यांना त्वरित त्यांनी जे बघितले त्याची माहिती दिली. लेफ्टनंट राठोड यांनी लगेचच ‘त्या खडकावर चिनी अधिकारी हक्क सांगत आहेत व त्यांच्या बरोबर त्यांचा एक राजकीय अधिकारीही आला आहे’ ही माहीती दिली व काय झाले ते सांगितले.
नायब सुभेदार ग्यान बहादूर लिंबू हे चिनी सैनिकांशी वाद घालत होते आणि वादावादीच्या दरम्यान त्या खडकावर त्यांनी आपला उजवा पाय ठेवला. त्याबरोबर एका चिनी सैनिकाने त्यांच्या पायाला लाथ मारली आणि तो त्या खडकावरून बाजूला सारला ‘आमच्या हद्दीत पाय ठेवायचा नाही इ. इ…. ‘
सुभेदारांनी आपला तोच पाय परत त्याच ठिकाणी ठेवला आणि त्या सैनिकांना आव्हान दिले. वातावरण फारच तापत चालले होते.
हे होत असताना उरलेल्या चिनी सैनिकांनी पटापट त्यांच्या जागा घेतल्या आणि आपल्या बंदूका सरसावल्या. बहुदा हे प्रकरण चिघळवायचे हे त्यांचे अगोदरच ठरलेले असावे.
इकडे त्या चिनी सैनिकाने आपली संगीन सुभेदारांवर चालवली. त्याचा घाव बसला त्यांच्या हातावर.
पुढे काय झाले ते सिनेमातल्या सारखे होते. ज्या सैनिकांने हा हल्ला केला त्याचे दोन्ही हात कुकरीने धडावेगळे झालेले त्यालाच कळले नाही.
हे बघताच जागा घेतलेल्या चिनी सैनिकांनी बंदूका चालवायला सुरुवात केली. दोन्ही बाजूने गोळीबार चालू झाला आणि लान्स नाईक कृष्णा बहादूर यांनी आपले सैनिक घेऊन हल्ल्यासाठी एकत्रीत होणार्या चिन्यांवर हल्ला चढवला.
त्यांच्या मागेच “आयो गुरखाली” ही युद्ध गर्जना देत देवी प्रसाद हा जवान त्वेषाने चिन्यांवर तुटून पडला. पहिल्याच झटक्यात त्याने आपल्या कुकरीने पाच चिन्यांची डोकी उडवली.
सुभेदार लिंबू यांना छातीत लागलेल्या एका गोळीने वीरगती प्राप्त झाली. त्यांना, या दाखवलेल्या धैर्याबद्दल आणि पराक्रमाबद्दल मरणोत्तर वीरचक्र देण्यात आले.
लान्स नाईक कृष्ण बहादूर यांचे शव नंतर चिनी सैनिकांनी लष्करी इतमामाने परत केले. ते परत करायला जो चिनी अधिकारी आला होता त्याला इंग्रजी येत होते आणि त्याने कबूली दिली की “भारतीय सैनिक वाघांसारखे लढले.”
या घटनेचे महत्व १९६२ सालच्या युद्धात झालेल्या मानहानी नंतर प्रचंड होते. चिनी सैनिकांच्या मनातल्या भारतीय सैनिकांबद्दलच्या कल्पनांना जोरदार धक्का बसला.
इकडे नं १५४० वर लेफ्टनंट राठोड यांना गोळी लागून ते जखमी झाले.
हालचाल दिसताच चिनी सैनिकांनी आकाशात प्रकाश फेकणारे फ्लेअर्स उडवले तेव्हा त्यांना उमगले की त्यांच्या तिन्ही बाजूला गुरखा सैनिक आहेत आणि पुढून हल्ला होणार आहे. त्यांनी एकही गोळी न उडवता सन्मानाने माघार घेतली.
त्याच संध्याकाळी ज्या खडकावरून हे सगळे घडले त्या खडकावर मेजर जोशींनी परत आपला बूट ठेवला आणि त्यांना कोणीही हटकले नाही………….
वाचकहो, त्या निर्जन भागात त्या पाच मिटर जमिनीच्या तुकड्यावर असलेल्या त्या खडकाची किंमत काय, हे तहात जे हरतात, किंवा जे आपल्या ताब्यातला भुभाग शत्रूला सहज देऊन टाकतात, त्यांना कशी कळावी….?
या आणि नथू खिंडीत झालेल्या चकमकींमुळे चिनी सैन्याचा जो दबदबा उगिचच आपल्या सामान्य सैनिकांमधे पसरला होता तो कायमचा नष्ट झाला……… त्याचे उदा. आपण आत्ताच पाहिले.
लेखक : श्री जयंत कुलकर्णी
प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनावणे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “उसळ-चपातीचे ऋण…!!” – लेखक – अज्ञात ☆ श्री सुनीत मुळे ☆
एकदा भीमसेन जोशी (अण्णा) गाण्याच्या मैफलीसाठी गुलबर्ग्यात गेले होते. ते आटपून अण्णांची गाडी परतीच्या प्रवासात होती. रात्रीची दोनची वेळ असेल. गाडी चालवता चालवता अण्णांनी मुख्य रस्ता सोडला आणि एका आडगावाच्या वाटेला लागले. साथीदारांना कळेचना की हे कुठे चाललेत.
तेवढ्यात अण्णा म्हणाले, “आमचे एक गुरुजी इथून जवळच राहतात. आता अनायसे या वाटेनं चाललोच आहोत तर त्यांना भेटू या.. !”
रात्री दोनची वेळ असल्यामुळे गावात सामसूम होती. थोड्या वेळाने एका अंधार्या खोपटापुढे अण्णांची गाडी उभी राहिली.. मंडळी गाडीतून उतरली.
अण्णांनी खोपटाचं दार ठोठावलं. एका वयस्कर बाईनं दार उघडलं. चिमणी मोठी केली आणि खोपटात प्रकाश पसरला. खाटेवर एक वयस्कर गृहस्थ पहुडला होता. त्याचं नाव रामण्णा.. !
अण्णा त्यांच्यापाशी गेले आणि त्यांना हात देऊन बसतं केलं.. अण्णा म्हणाले, ‘काय, कसं काय? ओळखलंत का? बर्याच दिवसांनी आलो, अलीकडे वेळच मिळत नाही..’ अण्णा कानडीतनं बोलत होते.
रामण्णाही ओळखीचं हसले.. थोड्या गप्पा आणि विचारपूस झाल्यावर अण्णांनी रामण्णाच्या पायांवर डोकं ठेऊन त्यांना नमस्कार केला आणि खिशातलं २०-२५ हजारांचं बिदागीचं पाकिट त्यांच्या हातात दिलं.. आणि त्यांचा निरोप घेतला..
साथीदार मंडळींना हा प्रकार काय आहे, हेच कळेना. तेव्हा अण्णांनीच खुलासा केला –
“इथून जवळच्याच एका रेल्वे स्थानकात (होटगीच्या आसपास) एके काळी मी बेवारशी राहायचो. सायडिंगला जे डबे लागत त्यातच झोपायचो. तिथेच रेल्वेच्या थंडगार पाण्याने आंघोळ उरकायचो. खिशात दमडा नव्हता. गाणं शिकण्यासाठी घरातून पळालो होतो. कानडीशिवाय दुसरी कोणतीही भाषा येत नव्हती. भिकारी अवस्थाच होती.
स्टेशनच्या बाहेरच तेव्हा हा रामण्णा त्याची हातगाडी लावत असे. मुगाची पातळ उसळ आणि चपात्या तो विकायचा. मस्त वास यायचा त्याच्या गाडीभोवती. मी तिथेच घुटमळायचा.. आमची ओळख झाली. गदगच्या जोशी मास्तरांचा मुलगा. गाणं शिकायचं आहे. इतपत जुजबी ओळख मी त्याला दिली”.
“उसळ-चपाती पाहिजे काय?”, असं तो मला विचारायचा. माझ्या खिशात दमडा नव्हता.
रामण्णा म्हणायचा, “तुला गाणं येतं ना? मग मला म्हणून दाखव. तरच मी तुला खायला देईन. फुकट नाही देणार.. !”
“घरी माझी आई जी काही कानडी भजनं आणि अभंग गायची, तेवढीच मला गाता येत होती. रामण्णाला दोन भजनं म्हणून दाखवली की तो मला पोटभर खायला द्यायचा..!”
“जो पर्यंत त्या स्टेशनात मुक्काम ठोकून होतो, तोपर्यंत मला रामण्णा खायला द्यायचा. पण फुकट कधीही नाही.
रामण्णाचा निरोप घेऊन गाडी पुन्हा परतीच्या वाटेवर भरधाव वेगाने निघाली होती.. साथीदार मंडळी गप्प होती.. गाडीमध्ये शांतता होती. धीरगंभीर चेहर्याचे स्वरभास्कर गाडी चालवत होते..
रामण्णाच्या खोपटात भविष्यातला भारतरत्न येऊन मुगाची उसळ आणि चपातीच्या खाल्ल्या अन्नाला नमस्कार करून गेला होता.
हात आभाळाला टेकले तरी पाय जमिनीवर असलेला माणूस…..
… “ स्वरभास्कर “
लेखक : अज्ञात
प्रस्तुती : श्री सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
सहा वेळा अमेरिकेत जाऊन मी बरीच शहरे पाहिली. तशी या वर्षांत देखील पाहिली. संपूर्ण कॅलिफोर्निया पाहिला. पण मनात भरले ते फक्त शिकागो शहर !! विंडी सिटी म्हणजे वाऱ्याचे शहर म्हणून प्रसिद्ध असलेले हे शहर मिशिगन राज्यात मिशिगन लेक या समुद्रासारख्या मोठ्या सरोवराकाठी वसले आहे. खूप वर्षांपासून मला ते सुंदर शहर पहायचे होते. यावर्षी तो योग आला.
हे शहर पाहण्याचे मुख्य कारण केवळ स्वामी विवेकानंद हे होय. शिकागोमध्ये झालेली सर्व धर्म परिषद, फक्त गाजली ती स्वामीजींनी केलेल्या भाषणामुळेच !!!! प्रत्येक भारतीयाला या गोष्टीचा प्रचंड अभिमानच आहे.
The Art Institute of Chicago या नावाने प्रसिद्ध असलेल्या बिल्डिंगमध्ये स्वामीजींनी सर्व धर्म परिषदेत जे व्याख्यान दिले, ते जगप्रसिद्ध आहे. जगभरात खूप सर्वधर्म परिषद झालेल्या आहेत. पण ही सर्वधर्म परिषद आजतागायत सर्वांच्या स्मरणात आहे– ते फक्त स्वामी विवेकानंद यांच्यामुळेच!!!!
या परिषदेस हिंदू धर्माच्या एकाही प्रतिनिधीला निमंत्रण नव्हते. या आधीच्या कुठल्याही सर्वधर्म परिषदेत हिंदू धर्माचा एकही प्रतिनिधी नसे. पण स्वामीजी या परिषदेसाठी भारतातून कसेबसे शिकागोला पोहोचले. खूप प्रयत्न करून, असंख्य लोकांना भेटून शेवटी त्यांनी या सर्व धर्म परिषदेत प्रवेश मिळविला. आर्थिक मदत मिळविली आणि बोटीत बसून दोन महिन्यांनी ते शिकागोत पोहोचले. अर्धपोटी व प्रसंगी उपाशी राहून त्यांनी दिवस काढले.
सर्वात शेवटी पाच मिनिटे भाषण करण्याची त्यांना परवानगी कशीबशी मिळाली. त्यांनी आपला धर्मग्रंथ म्हणून श्रीमद् भगवद्गीता नेलेली होती. तीही आयोजकांनी सर्व धर्मग्रंथांच्या खाली ठेवली. सर्वांची व्याख्याने झाल्यावर स्वामीजी बोलायला उभे राहिले. इतर सर्वजण सुटा बुटात होते. एकटे स्वामीजी भगव्या वस्त्रात होते.
त्यांनी सुरुवातीलाच शब्द उच्चारले “माय ब्रदर्स अँड सिस्टर्स ऑफ अमेरिका” !!!!!
आणि जो टाळ्यांचा कडकडाट झाला, तो अडीच मिनिटे त्या भल्या मोठ्या सभागृहात निनादत होता. पुढे पाच मिनिटांचे भाषण दीड तास लांबले. पूर्ण सभागृह दीड तास मंत्रमुग्ध झाले होते. स्वामीजींनी इतिहास रचला होता. त्यात त्यांनी हिंदू धर्माविषयी अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. आणि हिंदू धर्माविषयी इतरांच्या मनातील गैरसमज दूर केले. जगात हिंदू धर्माला मानाचे स्थान स्वामीजींनी मिळवून दिले. शेवटी त्यांनी सांगितले की, “हा माझा धर्मग्रंथ– सर्व धर्मग्रंथांच्या खाली ठेवला आहे. याचे कारणच असे आहे की, जगातील सर्व धर्मांचे व धर्मग्रंथांचे तत्वज्ञान याचे मूळच या भगवद्गीते मध्ये आहे. “
याच कारणाने ही सर्व धर्म परिषद गाजली. ती जिथे झाली ती इमारत आम्ही पाहिली. तिथे एका रूम मध्ये स्वामीजींविषयी, त्या परिषदेविषयी सर्व पुस्तके आहेत. स्वामीजींची छोटी मूर्ती तिथे ठेवलेली आहे. बाहेर हमरस्ता जो आहे, त्यावर “स्वामी विवेकानंद पथ” अशी इंग्रजीतली ठळक निशाणी आहे. ती पाहून अभिमानाने ऊर भरून आला.
शिकागो जवळच्याच नेपरविले या गावाकडे जाताना वाटेवरच स्वामी विवेकानंदांच्या स्मृती जपणारा “विवेकानंद वेदांत सोसायटी” नावाचा आश्रम आहे. आजूबाजूस संपूर्ण जंगल भोवती असून, मध्ये हा आश्रम होता. आश्रमात पोहोचेपर्यंत रस्ता चांगला असूनही, कुठेही माणूसच काय, पण गाडीही दिसत नव्हती.
आम्ही बाहेर गाडी पार्क केली आणि बंद दार उघडून आत गेलो. तिथे मात्र दोघे तिघेजण होते. त्यांनी आम्हाला तेथील मोठी लायब्ररी, स्वयंपाक घर डायनिंग हॉल सगळं दाखवलं.
लिफ्टने वरच्या मजल्यावर गेलो. तिथे एक ध्यानमंदिर आहे. ते एक मोठे सभागृह आहे. 100 जण बसतील एवढ्या खुर्च्या तिथे आहेत. एखाद्या देवघरात बसल्यानंतर शांत वाटावे तसे इथे वाटते. देवघरासारख्या या ध्यानमंदिरात आम्ही काही वेळ शांत बसलो. तिथे — विवेकानंद सर्व धर्मामधील काहीतरी चांगली तत्त्वज्ञाने आहेत– असे मानत होते. त्यामुळे अनेक धर्मांची प्रतीके तिथे लावलेली आहेत.
बाहेरच्या हॉलमध्ये स्वामी विवेकानंदांचे पूर्ण चरित्र, काही चित्रे, फोटो आणि माहिती या स्वरूपात भिंतीवर लावलेले आहे. त्यामध्ये स्वामीजी अमेरिकेत कसे आले, त्या सर्वधर्म परिषदेत भाषण देण्यासाठी ते कुणाकुणाला भेटले, कोणी त्यांना मदत केली तर कोणी झिडकारून लावले. शेवटी कशीबशी परवानगी स्वामींना मिळाली. ही सर्व माहिती व फोटो आम्ही वाचले, आम्ही पाहिले. तिथेच आम्हाला स्वामीजींच्या विषयी खूप माहिती मिळाली आणि अभिमान वाटला.
अजून एक The Hindu Temple of Greater Chicago या नावाने प्रसिद्ध असलेले मंदिर आहे. इथे अनेक देवतांचे छोटे छोटे गाभारे आहेत. अमेरिकेत जी जी हिंदू मंदिरे पाहिली तिथे असेच स्वरूप दिसते. या ग्रेटर शिकागो मंदिरात मुख्य गाभाऱ्यात श्रीराम, लक्ष्मण, सीता यांच्या मूर्ती आहेत. हिंदू धर्म प्रसाराचे हे एक मोठे केंद्र आहे. खूपच मोठा विस्तार आहे या मंदिराचा!!!
मंदिर जरा चढावर आहे. येण्याच्या वाटेवर खूप सुंदर परिसर आहे. एके ठिकाणी उजव्या हाताला एक मोठी व रेखीव सुंदर मेघडंबरी आहे. त्यात स्वामी विवेकानंदांचा पूर्णाकृती पुतळा आहे. तो पाहून खूप आनंद आणि समाधान झाले.
परक्या देशातही आपल्या सनातन धर्माची ध्वजा स्वामीजींनी आजही फडकवत ठेवली आहे. आणि त्या देशाने या स्मृती खूप चांगल्या रीतीने जपल्या आहेत. याचा आम्हास नितांत गर्व आहे.
गुरुवार दिनांक नऊ जानेवारी २०२५ रोजी इस्रो म्हणजेच भारतीय अंतराळ संशोधन संस्था, यांनी एक अभूतपूर्व यशस्वी प्रयोग घडवून आणला. …. अंतराळात दोन उपग्रह एकमेकांना जोडण्याचा आणि पुन्हा एकमेकांपासून विभक्त करण्याचा हा तो प्रयोग म्हणजे ‘स्पॅडेक्स’.
अशा तऱ्हेने अंतराळात उपग्रह एकमेकांना जोडणारा भारत हा जगातील चौथा देश ठरला आहे. त्याचप्रमाणे अंतराळामध्ये चवळीचे बी रूजवून त्यांना मोड आणि पाने फुटल्याचा सुद्धा एक यशस्वी प्रयोग याआधी संस्थेने घडवून आणला आहे.
खरं म्हणजे इस्रो या संस्थेची सुरुवातीपासून आतापर्यंतची यशस्वी घोडदौड हा सर्व माध्यमांचा सर्वात जास्त आकर्षणाचा विषय असला पाहिजे. एखादी कादंबरी अथवा सिनेमाची कथा किंवा एखादी फॅन्टसी म्हणजेच अद्भुतकथा म्हणून सुद्धा ती खूप आकर्षक आहे. असे असताना एवढी महत्त्वाची मोठी बातमी लोकांना आकर्षक आणि सोप्या पद्धतीने समजावून सांगण्याचा एखादा कार्यक्रम म्हणजे एखाद्या अद्भुत कथेच्या कथाकथनाचा कार्यक्रम होऊ शकेल.
देशात बनलेला पहिला उपग्रह आर्यभट्ट, देशामध्ये बनलेले पहिले रॉकेट पीएसएलव्ही, मंगळयान, चांद्रयान आणि आत्ताचा हा स्पॅडेक्स हे प्रकल्प म्हणजे आपल्या आगामी चांद्र मोहिमेची यशस्वी पूर्वतयारीही नक्कीच म्हणता येईल. तसेच हे सर्व प्रयोग म्हणजे भारताकडे आता अंतराळातील प्रयोगशाळा उभारण्याची संपूर्ण क्षमता आली आहे याची खातरजमा आहे.
एच जी वेल्सच्या कल्पनेपेक्षाही सुरस अशा या कथा. कथा कसल्या? प्रत्यक्ष घटनाच. आपल्या देशातील तरुणांना केवढी मोठी प्रेरणा देऊ शकतील याची कुणाला जाणीव का होत नाही?
दुसरा एक विचार मनात येतो आपल्या देशात सर्व सरकारी यंत्रणा अनेक वेळा अनेक अनैतिक चक्रात सापडलेल्या, प्रचंड नुकसानीत सापडलेल्या किंवा बंद पडलेल्या दिसून येतात. पण ही संस्था अशी नासली नाही, दुराचाराने ग्रासली नाही. हे सुद्धा आपल्या शास्त्रज्ञांचे फार मोठे यश म्हणता येणार नाही काय?
खरं म्हणजे माझ्या दृष्टीने गुरुवारची स्पॅडेक्स संबंधीची बातमी सगळ्यात मोठी आणि सगळ्यात महत्त्वाची बातमी. निदान भारतीय माध्यमांनी तरी या बातमीची मोठ्या प्रमाणावर दखल घ्यायला हवी होती. माझ्या दृष्टीने सगळ्या वर्तमानपत्रांची मथळ्याची बातमी (हेड लाईन) ही असायला हवी होती. सगळ्या वाहिन्यांवर दिवसभर ही बातमी प्रामुख्याने झळकायला हवी होती. त्यावर सतत चर्चा किंवा चर्चासत्रे आणि व्याख्याने यांचे आयोजन केले जायला हवे होते. ज्या काही बातम्या आपल्या सर्व वाहिन्यांवर झळकत आहेत त्यापेक्षा कितीतरी महत्त्वाची आणि अभिमानाची ही बातमी सर्वांच्या दृष्टीनेच असायला हवी होती. वृत्तपत्रांनी कुठेतरी कोपऱ्यात किंवा ई-आवृत्तीमध्ये चार ओळीत या बातमीची वासलात लावली. मराठी वाहिन्यांवर तर मला कुठेच ही बातमी आढळली नाही. अर्थात कुणीतरी कुठेतरी एक दोन वाक्यात ती गुंडाळली असण्याची शक्यता आहे. पण ती दिवसभर सतत दाखवण्यासारखी महत्त्वाची बातमी नक्कीच होती. त्या प्रयोगाचे काय झाले हे जाणून घ्यायला मी इच्छुक होतो. म्हणून अनेक वाहिन्यांवर फिरलो. परंतु गुरुवारी काही मला ती बातमी समजू शकली नाही. शुक्रवारी व्हाट्सअप वर किंवा गुगल वर ही बातमी शोधून सापडली. अशी बातमी शोधावी लागते हे आपले आणि आपल्या देशाचे दुर्दैव आणि माध्यमांचा नाकर्तेपणा समजावा काय?
खरे म्हणजे सगळ्या मराठी वाहिन्यांनी त्यांचा वार्ताहर स्वतंत्रपणे बेंगलोरला पाठवून इस्रोच्या शास्त्रज्ञांच्या मुलाखती घेणे, ही माहिती मिळवून प्रस्तुत करणे, अशा प्रकारे खूप काही करणे आवश्यक होते. आपल्या देशाच्या दृष्टीने आणि संपूर्ण जगाच्या दृष्टीने सुद्धा या बातम्यांना मोठे महत्त्व आहे हे आपल्या स्वकीयांना समजेल तो सुदिन.
आदरणीय पूर्व राष्ट्रपती श्री अब्दुल कलाम यांनी इस्रायलच्या भेटीतील त्यांची एक आठवण सांगितली होती. इस्रायलमध्ये ते गेले असताना त्यावेळी इस्राईलचे युद्ध चालू होते. परंतु जेव्हा त्यांनी सकाळी तेथील वर्तमानपत्र पाहिले, तेव्हा वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर मथळ्याच्या बातमीवर (हेडलाईन वर) त्या देशामध्ये एका शेतकऱ्याने शेतीचा एक यशस्वी प्रयोग करून दाखवला त्याबद्दलची माहिती व फोटो संपूर्ण पहिले पान त्या प्रयोगावर आधारले होते. युद्धाच्या बातम्या आतील पानांवर होत्या. कोणत्या गोष्टीला किती महत्त्व द्यायचे हे जेव्हा आपल्या माध्यमांनाही समजेल तो सुदिन.
सध्या आपण आपल्या देशाच्या भावी पिढ्यांच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवून भविष्याकडे नजर लावून आशावाद जपायला हरकत असू नये असे वाटते. आपण आपल्या आयुष्यात या राष्ट्रासाठी फारसे काही करू शकलो नाही असे वाटणाऱ्या माझ्यासारख्या ज्येष्ठ नागरिकांनी जाता जाता निदान या आशेचा सुगंध वातावरणात पसरून जावे एवढी तरी इच्छा धरू या !