मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय पाचवा— कर्मसंन्यासयोग — (श्लोक २१ ते २९) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय पाचवा— कर्मसंन्यासयोग — (श्लोक २१ ते २९) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

बाह्यस्पर्शेष्वसक्तात्मा विन्दत्यात्मनि यत्सुखम् ।

स ब्रह्मयोगयुक्तात्मा सुखमक्षयमश्नुते ।।२१।।

*

आसक्ती ना विषयसुखांची अंतर्यामी सुखानंद 

ध्यान तयाचे परब्रह्मी  निरंतर समाधानानंद  ॥२१॥

*

ये हि संस्पर्शजा भोगा दु:खयोनय एव ते ।

आद्यन्तवन्त: कौन्तेय न तेषु रमते बुध: ।।२२।।

*

सुखदायी जरी भासती गात्रविषय भोग

दुःखदायी ते खचित असती तू त्यांना त्याग

क्षणात ते भंगुनिया जाती अनित्य ते अर्जुना

प्रज्ञावान विवेक ठेवी रुची त्यांच्यातुनी  ना ॥२२॥

*

शक्नोतीहैव य: सोढुं प्राक्शरीरविमोक्षणात् ।

कामक्रोधोद्भवं वेगं स युक्त: स सुखी नर: ।।२३।।

*

अधीन केले षड्रिपुविकार याची देही इहलोकी

जाणावे त्या योगी म्हणुनी तोच खरा या जगी सुखी ॥२३॥

*

योऽन्त:सुखोऽन्तरारामस्तथान्तर्ज्योतिरेव य: ।

स योगी ब्रह्मनिर्वाणं ब्रह्मभूतोऽधिगच्छति ।।२४।।

*

अंतरात्म्यात सुखी रत  आत्म्यात ज्ञानतेज जया प्राप्त 

योगी अद्वैत परमात्म्याशी शांत ब्रह्म तयासी  प्राप्त  ॥२४॥

*

लभन्ते ब्रह्मनिर्वाणमृषय: क्षीणकल्मषा: ।

छिन्नद्वैधा यतात्मान: सर्वभूतहिते रता: ।।२५।।

*

पापाचे ज्याच्या होत विमोचन  तमकिल्मिष नष्ट प्रकाश ज्ञान

सर्वभूत हितात रत मन परमात्मे स्थित ब्रह्मवेत्त्या परब्रह्म प्राप्त ॥२५॥

*

कामक्रोधवियुक्तानां यतीनां यतचेतसाम् ।

अभितो ब्रह्मनिर्वाणं वर्तते विदितात्मनाम् ।।२६।।

*

कामक्रोधापासून अलिप्त वश जया चित्त

परब्रह्म त्या साक्षात्कार परमात्मा हो सर्वत्र ॥२६॥

*

स्पर्शान्कृत्वा बहिर्बाह्यांश्चक्षुश्चैवान्तरे भ्रुवो: ।

प्राणापानौ समौ कृत्वा नासाभ्यन्तरचारिणौ ।।२७।।

यतेन्द्रियमनोबुद्धिर्मुनिर्मोक्षपरायण: ।

विगतेच्छाभयक्रोधो य: सदा मुक्त एव स: ।।२८।।

*

वैराग्य मनी रुजवुन । अलिप्त विषयांपासुन ॥

पंचेंद्रिय बुद्धी मन । सदा अपुल्या स्वाधिन ॥ 

भ्रूमध्यात दृष्टी स्थिर । प्राणापानासी रोखून ॥

ऐक्य हो सुषुम्नेतुन । ध्यानातुनी राही मग्न ॥

भयक्रोधेच्छा समस्त ।  नष्ट करूनी त्यागत ॥

वास्तव्य जरी देहात । मोक्षपरायण  मुक्त ॥२७-२८॥

*

भोक्तारं यज्ञतपसां सर्वलोकमहेश्वरम् ।

सुहृदं सर्वभूतानां ज्ञात्वा मां शान्तिमृच्छति ।।२९।।

*

मला जाणतो माझा भक्त यज्ञ तपांचा भोक्ता

सर्वलोक महेश्वर मी सुहृद म्हणोनी  सर्वभूता

प्रेमळ दयाळू निःस्वार्थी मी त्रिकाल आहे पार्थ

जाणीतो मनी हे तत्त्व  तयास शांती हो प्राप्त  ॥२९॥

*

ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे कर्मसंन्यासयोगो नाम पंचमोऽध्याय: ।।५।।

ॐ श्रीमद्भगवद्गीताउपनिषद तथा ब्रह्मविद्या योगशास्त्र विषयक श्रीकृष्णार्जुन संवादरूपी कर्मसंन्यासयोग नामे निशिकान्त भावानुवादित पंचमोऽध्याय संपूर्ण ॥५॥

— अध्याय पाचवा समाप्त —

– क्रमशः भाग तिसरा

अनुवादक : © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ फलटणमधील ‘सीतामातेचा डोंगर’… ☆ सुश्री सुनीला वैशंपायन ☆

सुश्री सुनीला वैशंपायन 

? इंद्रधनुष्य ?

☆ फलटणमधील ‘सीतामातेचा डोंगर’… ☆ सुश्री सुनीला वैशंपायन 

– श्री क्षेत्र सोमनथळी 

फलटणमधील ‘सीतामातेचा डोंगर’

चला आपल्या फलटणबद्दल थोडेसे जाणून घेऊयात

राम रावणाच्या युद्धानंतर जेव्हा राम अयोध्येला परत आले तेव्हा लोकांनी सीतेबद्दल शंका घेण्यास सुरुवात केली. त्यामुळे नाईलाजाने रामाला सीतेचा त्याग करावा लागला. त्याने लक्ष्मणाला आज्ञा केली की सीतेला दूर कुठेतरी नेउन सोड. लक्ष्मण सीतेला घेऊन अयोध्येपासून खूप दूर आला. त्याने सीतेला एका ठिकाणी सोडलं आणि तो अयोध्येला निघून गेला…

लक्ष्मणाने सीतेला ज्या ठिकाणी सोडलं होतं ते ठिकाण आपल्या फलटणच्या शेजारी आजही ‘ सीतामातेचा डोंगर ‘ या नावाने प्रसिद्ध आहे. आजही हजारो स्त्रिया संक्रांतीच्या दिवशी या ठिकाणी सीतामातेला वाणवसा घ्यायला जातात…

याच आपल्या पावन भूमीत लव-कुश यांचा जन्म झाला. रामाने ज्यावेळी अश्वमेध यज्ञ केला त्यावेळी या यज्ञाप्रसंगी जो घोडा सोडलेला होता तो लव-कुशने पकडला… त्यानंतर लव-कुश यांच्याबरोबर लक्ष्मण, शत्रुघ्न, भारत, सुग्रीव यांनी युद्ध केलं.. मारुतीही या युद्धाच्यावेळी उपस्थित होते. मात्र त्यांना समजलं की ही दोन्ही मुले रामाचीच आहेत. त्यामुळे त्यांनी युद्धात सहभाग घेतला नाही. लव-कुशने हनुमंताला एका अस्त्राने एका लिंबाच्या झाडाला बांधून टाकलं …

हे युद्ध ज्या ठिकाणी झालं त्या ठिकाणाचा उल्लेख रामायणमध्ये ” फलपठठनपूर ” असा केलेला आहे. ज्याचा अपभ्रंश होऊन आज ते ठिकाण फलटण या नावाने ओळखल जातं … 

रामायणामध्ये असा उल्लेख आहे कि लव-कुशने हनुमंताला ‘सम्स्थलि’ बांधलेले…

‘सम्स्थळ’ म्हणजे समान जागा, जिथे चढ-उतार जास्त नाहीत अशी…

त्या ‘समस्थळचा’ अपभ्रंश होऊन आज ते ठिकाण ‘सोमन्थलि’ या नावाने प्रसिद्ध आहे.

खूप वर्षांपूर्वी या ठिकाणी एका स्त्रीला एका लिंबाच्या झाडाखाली पडलेल्या गाईच्या गोवरीमध्ये हनुमानाचे दर्शन झाले… ती बेशुद्ध होऊन पडली… काही लोक तिला पाहायला गेले तर त्यांनाही हनुमंताचे दर्शन मिळाले. ही वार्ता गावामध्ये वाऱ्यासारखी पसरली… त्या काळच्या एका प्रसिद्ध ब्राह्मणाकडून याबद्दलची माहिती काढण्यात आली. त्यावेळी हे तेच ठिकाण निघालं जेथे हनुमानाला बांधलेलं होत…मग लोकांनी भक्तिभावाने या ठिकाणी हनुमानाचे मंदिर बांधले. या मंदिराच्या पाठीमागे एक लिंबाचे झाड आहे. असे म्हणतात की हे लिंबाचे झाड मोठे होऊन जेव्हा मरून जातं तेव्हा त्याच ठिकाणी नवीन झाड उगवते. मारुतीचे दर्शन घेऊन मंदिराला प्रदक्षिणा घालताना पाठीमागच्या या झाडाला मिठी मारून दर्शन घेण्याची पद्धत आहे. नवसाला पावणारा हा मारुती दक्षिणमुखी आहे….चैत्र शुद्ध पौर्णिमेला सोमंथळी मध्ये मोठी यात्रा भरते… मित्रानो समर्थ रामदासांनी ११ मारुतींची स्थापना केली हे सर्वाना माहित आहे… मात्र हा मारुती स्वयंभू आहे. याची स्थापना केली गेली नाही… सोमंथळी मध्ये तो स्वतः: प्रगट झाला आहे…

” श्री स्वयंभू दक्षिणमुखी मारुती मंदिर, श्री क्षेत्र सोमंथळी ” या नावाने हे मंदिर प्रसिद्ध आहे. गुजरात, बिहार, उत्तर प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू याचबरोबर इतरही अनेक राज्यातून लोक येथे दर्शनाला येतात…

मात्र याच मातीतल्या बऱ्याच लोकांना या ठिकाणाची माहिती नाही… कारण आपण रामायणाची पारायणे करतो .. मात्र मनापासून कधी वाचत नाही.

एव्हढा पौराणिक आणि सांस्कृतिक वारसा असणाऱ्या ठिकाणी आपण वावरतोय याचा थोडा तरी अभिमान असू द्या…

|| जय श्री राम ||

|| जय हनुमान ||

माहिती प्रस्तुती : सुश्री सुनीला वैशंपायन 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘अनंत अमुची ध्येयासक्ती’… ☆ माहिती-प्रस्तुती : सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘अनंत अमुची ध्येयासक्ती’ ☆ माहिती-प्रस्तुती :  सौ. गौरी गाडेकर ☆

अवघ्या ६५ वर्षांची विद्यार्थिनी — श्रीमती विनया नागराज 

2018 च्या सप्टेंबर महिन्यात पुण्यातल्या सहकारनगर जवळच्या ICWA चॅप्टर क्लासमध्ये 64 वर्षांच्या एक आज्जीबाई एका वर्गात शिरल्या. तेव्हा वर्ग सुरू झाला होता. आणि समोर 20-21 वर्षांची मुलं त्यांच्या शिक्षिका आणि फळ्याकडे बघत होती. अचानक आज्जी दिसल्यावर पहिल्या बाकावर बसलेल्या मुलीला वाटलं, शिक्षिकेची आई किंवा नातेवाईक आली आहे. त्यांनी शिकवण्यात गुंग झालेल्या शिक्षिकेला तसं सांगितलंही. पण, आज्जीबाई उडालेली गंमत बघत शांतपणे त्या मुलीच्या शेजारी रिक्त असलेल्या बाकावर बसल्या. जमलेल्या 70-80 मुलांप्रमाणेच या आज्जीही ICWA या अवघड समजल्या जाणाऱ्या वाणिज्य अभ्यासक्रमाच्या पहिल्या कोर्सचा धडा गिरवणार होत्या.

आता 65 वर्षांच्या झालेल्या त्या आजी श्रीमती विनया नागराज यांनी काही तासांपूर्वीच मला तो सांगितला. विशेष म्हणजे या आजीनी गेल्याच आठवड्यात ICWAचा अभ्यासक्रम पहिल्या प्रयत्नात पूर्णही करून दाखवला आहे.

या अभ्यासक्रमाची यशस्वीतेची टक्केवारी 15 ते 20 इतकी असते. म्हणजे शंभरामध्ये फक्त 15 ते 20 मुलं परीक्षा पास होतात. सीएच्या खालोखाल कठीण अभ्यासक्रम तो मानला जातो. आणि त्यात विनया नागराज यांनी 59% गुण मिळवून बाजी मारली आहे.

‘मुलं चांगल्या ठिकाणी नोकरीला आहेत. नातू आता समजदार झाला आहे. मग अशावेळी फक्त टीव्ही बघत का वेळ घालवायचा. त्यापेक्षा कॉलेजनंतर जे करता आलं नाही ते स्वप्न का पूर्ण करू नये,’ असं म्हणत विनया यांनी आपला मागच्या दोन वर्षांचा काळ सत्कारणी लावला आहे.

‘मुलगी सीए असेल तर मुलगा मिळणार नाही’

विनया यांचं बालपण आधी कोल्हापूर आणि पुढे मुंबईत विले पार्ल्याला गेलं आहे. माध्यमिक शिक्षणक्रम म्हणजे तेव्हाची अकरावी त्यांनी उपजत हुशारीमुळे 14व्या वर्षीच पूर्ण केली. त्यानंतर बीकॉमही त्या मुंबईच्या डहाणूकर कॉलेजमधून 18 व्या वर्षी झाल्या.

— पण, ते वर्षं होतं 1974 मुंबई सारख्या ठिकाणीही मुली फारशा बाहेर दिसायच्या नाहीत. आणि कॉलेजमध्ये सुद्धा एखादी मुलींची रांग सोडली तर बाकी अख्खा वर्ग मुलांनीच भरलेला असायचा, असं विनया सांगतात. अशा परिस्थितीत मुलीला सीए व्हायचंय ही गोष्ट वडिलांना आणि घरी रुचणारी नव्हती. सीएच नाही तर मुलीने नोकरी करण्यालाही घरून विरोध होता. त्यामुळे विनया यांचं हे स्वप्न तेव्हा अपूर्णच राहिलं. पुढे काही कारणांनी एमकॉमची परीक्षाही त्यांना देता आली नाही.

तेवढ्यात लग्न झालं आणि दोन मुलांबरोबर प्रापंचिक जबाबदाऱ्याही वाढल्या. या धबडग्यात सीए व्हायचंय हे ही विनया विसरून गेल्या. त्यांची त्याबद्दल तक्रारही नव्हती. सासरच्या सहकार्याने त्यांनी बँक ऑफ बडोद्यात नोकरी मात्र मिळवली. आणि घर-संसार सांभाळत स्केल-टू ऑफिसर पर्यंत बढती मिळवली. अर्थात, या सगळ्यांत घरच्या ज्या जबाबदाऱ्या येत होत्या – घरची आजारपणं, कुणाचं दुखणं-खुपणं हीच त्यांच्यासाठी प्राधान्याची गोष्ट होती. अगदी घरातली गरज पाहून 2001 मध्ये त्यांनी या नोकरीतूनही स्वेच्छा निवृत्ती घेतली. बँकेत आणि घरातंही त्यांचं काम चोख होतं. करत असलेल्या कामात त्याही समाधानी होत्या.

पण, 2017 मध्ये त्यांचे पती वारले. दोन्ही मुलं सुमेध आणि सुकृत त्यांच्या त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी आणि संसारात रमली होती. नातू नऊ वर्षांचा म्हणजे जाणत्या वयाचा होता. अशा वेळी निवृत्त माणसाने काय करावं? — असा विचार जेव्हा विनया यांनी केला तेव्हा त्यांना आठवलं, त्यांचं एकेकाळचं स्वप्न सीए होण्याचं. त्यांनी चौकशी केली वयोमर्यादा आणि आणि आताच्या अभ्यासक्रमाची. मग कळलं इतक्या वर्षांनी आर्टिकलशिप शिवाय सीए शक्य होणार नाही. पण, आयसीडब्ल्यूए म्हणजे सीएमए शक्य होईल आणि ते झाल्यावर सीए साठीही अर्ज करता येईल.

…. झालं. 64 व्या वर्षी विनया नागराज यांचं ध्येय निश्चित झालं. सीएमए करायचं.

…. 65 व्या वर्षी अभ्यास आणि ऑनलाईन परीक्षा

अभ्यास आणि त्यासाठी लागणारं व्यवस्थापन हे विनया यांच्या अंगातच आहे. मानसिक तयारीही होती. पण, 1974 मध्ये सोडलेलं शिक्षण 2018मध्ये पुन्हा सुरू करायचं हे थोडीच सोपं होतं. काळ बदलला होता, अभ्यासक्रम बदलला होता, अभ्यासाची तंत्रं बदलली होती बरोबरचे विद्यार्थी बदललेले होते. सगळं नवंच होतं. पण, इच्छा असेल तर मार्ग सापडतो, ही काही फक्त म्हण नाही आहे. ती प्रत्यक्षातही उतरवता येते, असा विश्वास त्यांनी बाळगला.

नवीन अभ्यासक्रमात संगणकाविषयी ज्ञान अत्यावश्यक होतं. एक अख्खा पेपरच त्यावर होता. विनया यांनी बँकेच्या नोकरीतही कधी फारसा संगणक वापरला नव्हता. जो वापरला तो लॅन नेटवर्कवर… लेजर बुकशी त्यांची दोस्ती. म्हणजे आता संगणक शिकणं आलं. आणि मग त्या बरोबरी सगळेच नवीन असलेले विषय प्रत्येक कोर्सला चार याप्रमाणे..

नवीन जगात तरुण मुलं अभ्यासासाठी कुठली साधनं वापरतात, कोणती नवीन पुस्तकं उपलब्ध आहेत, क्लासेस नेमके कसे भरतात, यातल्या कशाचाही गंध नव्हता. पण, प्रयत्न सोडायचे नव्हते.

अभ्यास सुरू केला. आणि आयसीडब्ल्यूए संस्थेकडून पुस्तकंही आली, त्यांच्याकडूनही एक एक माहिती कळत गेली. संगणक कोर्सचं प्रशिक्षणही संस्थेकडूनच आयोजित केलं जातं हे कळलं. अभ्यासक्रमाचे क्लासेस भरतात ही माहिती मिळाली. त्याप्रमाणे संगणक आणि चॅप्टर क्लास दोन्हीची सुरुवात झाली.

सुरुवातीला सांगितलेला प्रसंग म्हणजे त्यांच्या या सीएमए चॅप्टर क्लासचा पहिला दिवस.

क्लासची चौकशी करण्यासाठी त्या आपल्या सात वर्षांच्या नातवाला घेऊन गेल्या होत्या.

कारण, आताही सीएमए करतोय म्हणजे घर चालवण्यापेक्षा वेगळं काहीतरी करतोय, अशा अभिनिवेश नव्हताच त्यांचा. घर सांभाळून अभ्यासाचं वेळापत्रक सांभाळणं जमेल एवढाच त्यांचा आत्मविश्वास होता.

बँकेच्या नोकरीत आणि एरवी चार-चौघात वावरतानाही फारशा न बोलणाऱ्या विनया आता मात्र क्लासमधल्या लहान मुलं आणि शिक्षकांमध्ये चांगल्या बोलू लागल्या होत्या. शंका विचारत होत्या आणि शिक्षकांच्या प्रश्नांना उत्तरंही देत होत्या. मुलं जी गणितं कुलकुलेटर करत तीच त्यांच्याही आधी या तोंडी सोडवत. अभ्यासातही क्लासमधील 20 वर्षांच्या मुलांपेक्षा त्या काकणभर सरसच आहेत ही गोष्ट हळुहळू इतरांच्या लक्षात आली. आणि क्लासमधली सगळी मुलं त्यांची मित्र झाली. संगणक शिकवायला या मुलांची आणि घरी सून दिशा यांची मदत झाली.

सुरुवातीला दर सहामाहीला एकच कोर्स घेणाऱ्या विनया यांनी जानेवारी 2021 मध्ये उर्वरित दोन्ही ग्रुपची परीक्षा एकत्रच दिली. कोव्हिडमुळे 2020 साली परीक्षाच होऊ शकली नव्हती. परीक्षा एकत्र देण्याचा विश्वास त्यांना त्यांचे पुणे चॅप्टर क्लासचे शिक्षक आणि बरोबरच्या विद्यार्थ्यांनी दिला. विशेष म्हणजे सुरुवातील संगणकावर बसायला घाबरणाऱ्या विनया यांनी शेवटची परीक्षा कोव्हिड मुळे ऑनलाईन म्हणजे पूर्णपणे संगणकावर दिली. आणि फायनलला त्यांना 59% गुण मिळाले.

आता त्यांनी सीए साठीही प्रवेश घेतला आहे.

‘अनंत अमुची ध्येयासक्ती’.. 

मानसोपचारतज्ज्ञ शैलेश उमाटे यांना विनया नागराज यांचं उदाहरण समाजात सकारात्मक उर्जा निर्माण करणारं वाटतं. “अनेकदा आयुष्याच्या पूर्वार्धात अपूर्ण राहिलेल्या इच्छांमुळे मनुष्य उत्तरार्धात आसवं तरी गाळतो. किंवा आपलं स्वप्न मुलं पूर्ण करतील असं म्हणत स्वप्न दुसऱ्यांवर लादतो. पण, विनया यांनी निवडलेला मार्ग आगळा वेगळा आहे,” शैलेश उमाटे यांनी सांगितलं.

त्यांनी निवडलेल्या स्वकर्तृत्वाच्या मार्गामुळे विनया यांचं जगणं मानसशास्त्रातल्या परिपूर्णता (MATURITY) किंवा ज्ञानदायी (WISDOM) अवस्थेकडे जातं. आणि या जगण्यातून त्यांना आणि कुटुंबीयांनाही समाधान मिळतं, असं वर्णन उमाटे यांनी केलं आहे.

शिवाय 65व्या वर्षी शिक्षण घेतल्यानंतर आपलं ज्ञान इतरांमध्ये वाटण्याची उर्मीही विनया यांच्याकडे आहे याविषयीही शैलेश उमाटे यांनी बोट दाखवलं आहे.

“स्वत:चं शिक्षण पूर्ण करण्याचं ध्येय त्यांनी बाळगलं. ते पूर्ण केलं. पण, त्याच बरोबरीने इतरांना शिकवण्याची तयारी दाखवून त्यांनी आपलं ध्येयही व्यापक केलं आहे. त्यामुळे त्यांना मिळणारी सकारात्मक उर्जा खूप वरची आहे,” असं उमाटे यांनी बोलून दाखवलं.

माहिती प्रस्तुती : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “आज आमचा नंबर आहे … पण उद्या ?” – लेखक : डॉ. प्रकाश कोयाडे ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

? इंद्रधनुष्य ?

☆ “आज आमचा नंबर आहे … पण उद्या ?” – लेखक : डॉ. प्रकाश कोयाडे ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर

गेल्या दोन दिवसांपासून आमचं कुटुंब एका विचित्र परिस्थितीमधून जात आहे. हे फार गंभीर आहे आणि तुमच्या सोबत हे घडू नये म्हणून हे इथं मांडतोय… २९ तारखेला दुपारी ३.२० वाजता माझ्या बायकोच्या व्हाट्सअपवर एक मेसेज आला ! 

मी ड्युटीवर होतो म्हणून डिटेल्स काही न सांगता ती एवढंच म्हणाली की, ‘ लवकर घरी या फार महत्त्वाचं बोलायचं आहे.’ चार वाजता घरी आलो तर तिने रडायला सुरुवात केली. आधी तिला समजावून सांगितले, शांत केलं आणि काय झालं आहे याबद्दल स्पष्ट विचारलं तेव्हा जे समजलं ते मलाही शॉकिंग होतं. कुठल्यातरी अनोळखी नंबर वरून तिला पैशाच्या मागणीसाठी मेसेज आला होता,  ज्यामध्ये —  

‘तुमचा आठशे रुपयांचा EMI बाकी आहे आणि तो भरा अन्यथा तुमचा फोटो व्हायरल करु’ अशी धमकी होती. 

आधी बायकोला पैसे मागितले तेव्हा त्यात काही वाटलं नाही पण समोरच्या व्यक्तीने एक मॉर्फ केलेला फोटो पाठवला. तेव्हा मात्र तिने एका सेकंदात तो फोटो डिलीट केला आणि तो नंबर ब्लॉक करून डिलीट केला.

पॅनिक न होता हे प्रकरण हाताळणं आवश्यक होतं, तिला धीर देणं त्याक्षणी सर्वात महत्वाची गोष्ट होती. समाधानाची गोष्ट हीच होती की, घाबरून जाऊन बायकोने समोरच्या व्यक्तीला पैसे पाठवले नव्हते!

आम्ही सायबर क्राईम ऑफिसला जाऊन कंप्लेंट केली. तसेच एक कंप्लेंट जवळच्या पोलिस स्टेशनलाही केली. तसं पाहिलं तर पोलिसांसोबत संपर्क रोजचाच पण आजचं कारण वेगळं होतं. त्यांनी फार शांतपणे सगळ्या गोष्टी समजावून घेतल्या आणि समजावून सांगितल्या. काहीही झालं तरी पॅनिक व्हायचं नाही आणि कोणालाही पैसे पाठवायचे नाहीत हे सांगितले… अर्थात आम्ही तेवढे स्ट्रॉंग होतोच! 

काल दुपारी आणखी एका नंबरवरून साडेतीन हजार रुपयांची मागणी केली. तसेच ‘तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमधील प्रत्येकाला फोन/मेसेज करून पैसे मागू’ अशी धमकी दिली. तो नंबर आणि डिटेल्सही पोलिसांना पाठवले. आणखी आठ दहा दिवस हे होतच राहणार आहे. बायकोने याबद्दल व्हाट्सअपवर स्टेटस ठेवलं आणि संपर्कातील जवळपास सर्वांना स्वतः सांगितलं जेणेकरून त्यांनाही याबाबत कळावं, त्यांना काही अडचण येऊ नये. 

तिने कोणतंही लोन ऍप्लिकेशन डाऊनलोड केलेलं नव्हतं. एक गोष्ट मात्र नक्की की, मोबाईल वापरतेवेळी तिच्याकडून कुठेतरी चूक झाली होती, एखाद्या अनोळखी लिंकवर क्लिक झालेलं असणार आहे.

आम्हाला हेही माहीत नाही की, समोरील व्यक्ती पुरुष आहे की स्त्री! बिहार, झारखंड या भागातील लोक असावेत. पोलिसांनी सांगितलं की दिवसाला किमान चार ते पाच केस आपल्याकडं अशा दाखल होत आहेत. सध्या याचं खूप प्रमाण वाढत आहे.

या प्रकरातून एक गोष्ट तर समजली आहे की, ते लोक माईंड गेम खेळत असतात. आपलं घाबरून जाणं हे त्यांचं भांडवल असतं. आपला मेंदू या गोष्टींसाठी तयार नसतो, बदनामीची भीती असते. हे लोक याच गोष्टींचा फायदा घेतात. जे लोक कोणाला याबाबत बोलत नाहीत, गोष्ट लपवून ठेवतात ते आणखी अडकत जातात. एका पोलिस मित्राच्या म्हणण्यानुसार काही प्रकरणं आत्महत्येपर्यंत सुद्धा पोहोचली आहेत. 

व्हाट्सअपवर स्टेटस ठेवलेलं बघून माझ्याच ओळखीच्या दोघांनी त्यांच्याबद्दल घडलेले असेच किस्से सांगितले. त्यापैकी एका मुलीने एका मेसेज मुळे घाबरून जाऊन पंचवीस हजार रुपये समोरच्याला दिले होते.

हे सर्व इथं का लिहितोय तर त्याला दोन कारणं आहेत. पहिली गोष्ट म्हणजे आमचा संदर्भ देऊन कोणी पैसे मागत असेल, धमकी देत असेल तर कोणी लक्ष देऊ नये. दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या कोणासोबत असं घडू नये आणि समजा घडलंच तर त्या जाळ्यात अडकू नये!

‘जमतारा’ ही वेब सीरीज ज्यांनी पाहिली असेल त्यांना माहीत असेलच हे सर्व. सीरीजच्या नावातच त्यांनी लिहिलं आहे… सबका नंबर आयेगा ! आपल्या मोबाईलमधली माहिती सुरक्षित नाही. कोणतंही ऍप्लिकेशन घेताना, काहीच न वाचता आपण ‘I Agree’ करतो. कोणत्याही लिंक नकळत उघडतो आणि हे चक्र सुरू होतं. 

आज आमचा नंबर आहे उद्या कोणाचाही असू शकतो… so be careful!

लेखक : डॉ.प्रकाश कोयाडे

संग्राहक : श्री मोहन निमोणकर

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “फक्त अर्धा ग्लास पाणी” ☆ संग्राहक – श्री माधव केळकर ☆

?इंद्रधनुष्य?

 ☆ “फक्त अर्धा ग्लास पाणी” ☆ संग्राहक – श्री माधव केळकर ☆

आज काही मित्रांना भेटायला एका हॉटेल मधे गेलो होतो..

विषय अर्थातच पाण्याचा होता, गप्पा चालू होत्या, विषय जसा-जसा पुढे सरकत होता, तसं एक observe करत होतो, अनेक टेबल्सवर लोक बिल पे करून निघून जाताना पिऊन उरलेले पाण्याचे अर्धे ग्लास तसेच राहत होते… गोष्ट अतिशय नॉर्मल अन कित्येकदा स्वतः केलेलीही अन पाहिलेलीही…

आमच्याही टेबल वर जाताना मला 4 ग्लास अर्धेच दिसले. आमच्याच नकळत घडलेलं हे.

मनाला काहीतरी खटकत होतं.

मिटिंग संपली. सगळे बाहेर आलो. मित्रांना Bye करून परत हॉटेल मध्ये घुसलो. परवानगी घेतली अन वेटर्सचा मॅनेजर होता त्याला भेटलो. 

म्हटलं, हे आता जे आमच्या टेबलवरचं चार अर्ध ग्लास पाणी होतं, त्याचं काय केलं?

तो म्हटला ज्या वेटरने टेबल क्लिअर केला असेल त्याने ते पाणी बेसिन मधे ओतून दिलं असणार, तेच करतो आम्ही. त्या उष्ट्या पाण्याचा काही उपयोग नाही ना आता.!

 म्हटलं विक-डेज मधे तासाला अंदाजे किती लोक येत असतील?

तो म्हटला, नाही म्हटलं तरी 15 ते 20 जण सरासरी. दुपारी लंचला अन रात्री डिनरला जास्त.

म्हटलं. म्हणजे 10 तास हॉटेल चालू आहे असं पकडलं तर साधारण सरासरी 250 जण एका दिवसात हॉटेलला येतात. हेच शनिवार रविवार दुप्पट होणार. त्यातून तुमचं हे छोटं हॉटेल. मोठ्या हॉटेल्सची हीच संख्या हजारात असणार!

म्हणजे सरासरी रोज 350 जण. यातल्या साधारण 200 जणांनी जरी अर्धा किंवा एक ग्लास पाणी न पिता तसंच ठेवलं तर अंदाजे 100 लिटर पाणी बेसिन मधे “रोज वाया”.

म्हणजे एक हॉटेल कमीतकमी 100 लिटर “अतिशय चांगलं अन प्रोसेस्ड पाणी” बेसिन मधे रोज ओतून देतं. हे पाणी ड्रेनेज मधून जाऊन शेवटी नदीच्या इतर ‘घाण’ पाण्यात मिसळतं.

पुण्यात सध्या अंदाजे छोटे मोठे पकडून 6000 च्या वर हॉटेल्स आहेत. 

म्हणजे दिवसाला 6000*100 लिटर,

 म्हणजे 6 लाख लिटर प्यायचं पाणी आपण रोज नुसतं ओतून देतोय. आता या घडीला.

हे झालं एका दिवसाचं , असं आठवड्याचं म्हटलं तर 42 लाख लिटर अन वर्षांचं म्हटलं तर 22 कोटी लिटर शुद्ध पिण्याचं पाणी आपण फक्त ओतून देतोय. या पाण्याला शुद्ध करायचा आलेला खर्च वेगळाच.

हे एका शहराचं, अशी महाराष्ट्रात कमीत कमी 15 मोठी शहरं आहेत . मुंबई, औरंगाबाद, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, वगैरे वगैरे कित्येक.

बर हे कोणत्या देशात, कोणत्या राज्यात घडतंय?? तर जिथं सरकारी आकडेवारीनुसार जर 4 तासाला एक जण ‘शुद्ध पाण्याअभावी’ होणाऱ्या डायरिया सारख्या रोगाने मरतोय त्या राज्या देशात. म्हणजे एका बाजूला लोक पाण्यावाचून तडपून मरतायत अन दुसऱ्या बाजूला एवढं शुद्ध केलेलं पाणी आपणच मातीत मिसळतोय.

बरं हे पाणी येतं कुठून..तर आपल्या आसपासच्या dams मधून. पुण्याच्या आसपास 7 dams आहेत, पुण्याला दरवर्षी साधारण 13 TMC पाणी लागतं, अन यावर्षी उपलब्ध पाणी आहे 17 TMC,  उरलेलं 4 TMC पाणी शेतीला. 

यावर्षी मात्र पाऊस कमी झाल्याने अन पुण्याची लोकसंख्या सतत वाढत असल्याने शेवटी राज्य सरकारने आदेश दिलेत की 17 TMC पाणी हे पुण्याला देण्यात यावं  म्हणजे शेतीला उन्हाळी आवर्तनासाठी पाणी जवळ-जवळ नाहीच!!. म्हणजे आपण जे वाया घालवतोय ते या शेतकऱ्यांच्या हक्काचं पाणी आहे. “उद्या शेतकऱ्याच्या गळ्यात पडणारे फास आपण आपल्या हातानेच एका बाजूला आवळत असताना, दुसऱ्या बाजूला आपणच त्यांना वाचवायच्याही बाता करतोय”… हा क्रूर विरोधाभास आहे!

पण हे सगळं थांबू शकतं, फक्त तुमच्या ओठातून येणाऱ्या “दोन” शब्दांनी.. मोजून दोन… 

इथून पुढं कधीही वेटर समोर तुमच्या ग्लास मधे पाणी ओतत असेल तर त्याला फक्त एवढंच म्हणा … अर्धा ग्लास!! 

याने तुम्हाला लागेल एवढंच पाणी तुम्ही घ्याल अन उरलेलं पाणी वाचेल, हॉटेलचं वाचलं म्हणजे नगरपालिकेचं, नगरपालिकेचं वाचलं म्हणजे धरणांचं अन धरणांचं वाचलं म्हणजे “आपलंच..!!”

फार छोटी गोष्टय,  फक्त दोन शब्द उच्चारायचेत पण तुमचे दोन शब्द तुमचेच 22 कोटी लिटर पाणी वाचवू शकतात…

लक्षात ठेवा ज्या प्रगत मानवजातीने, सेकंदाच्या दहाव्या भागाच्या प्रिसीजनने परग्रहावर माणूस यशस्वी उतरवलाय,, त्याच मानवजातीला अजून पर्यंत ‘पाणी’ मात्र निर्माण करता आलेलं नाहीये..

मग आपण जे निर्माण करत नाही, ते कमीतकमी वाचवूयात तरी की… तेही आपल्याच माणसांसाठी…!! 

सो इथून पुढं हॉटेल मध्ये असलो की …. “अर्धाच ग्लास पाणी..!!!”

— ( हे फक्त पुण्यातच घडतं असं समजुन दुर्लक्ष करु नका…. पोस्ट गरजेची म्हणून पाठवली, साभार : डी डी कट्टा ग्रुप)

संग्राहक : श्री माधव केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मोडेन पण वाकणार नाही… ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित ☆

सौ राधिका -माजगावकर- पंडित

? इंद्रधनुष्य ?

मोडेन पण वाकणार नाही… ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित

आमचे काका ति स्वः दामोदर सखाराम माजगांवकर देहू रोड येथे मिलीट्रीत होते. आर्मितल्या,ब्रिटीश राजवटीत हुतात्मा झालेल्या  शूरवीरांच्या कथा सांगण्यांत त्यांचा हातखंडा होता- ऐकतांना प्रसंग डोळ्या समोर  उभा राहयचा.लहानपणी मनावर ठसलेली, कोरलेली,  अंगावर शहारे  आणणारी ही कथा आहे; श्री कर्णिकांची.  पुण्यातल्या श्री तांबडी जोगेश्वरीवरून बुधवार चौकाकडे जाणाऱा सरळ रस्ता,..थोडक्यात म्हणजे हल्लीचं श्रीदगडुशेट   गणपती   मंदिर, श्री गणेश वास्तव्य आहे नां ! तोचं तो रस्ता.  त्याच्या डावीकडे फरासखाना पोलीस चौकी आहे. तिथेच एक दिपस्तंभ अजूनही कित्येक वर्षाचा, जुना झाला तरी भक्कमपणे उभा आहे. आणि त्यावर नांव कोरलय” –भास्कर दा.कर्णिक.–   कर्णिकांनी आपल्या देशासाठी फार मोठ्ठ बलिदान केलंआहे . पण=पण आज पुणेकर त्यांना विसरले आहेत. हा स्तंभ म्हणजे कसलं प्रतिक आहे? कुणाच्या नावांची ही निशाणी?      श्री कर्णिकांच्या बरोबरच त्यांची निशाणी, काळाच्या पडद्याआड गेलीय. पण त्यांचा आदर्श -त्यांचं बलिदान, त्यांच नांव आपण मनांत जागवूया. श्री.भास्कर दा.कर्णिक ऑडिनन्स फॅक्टरीत नोकरीला होते. हुषार आणि अत्यंत धाडसी व्यक्तिमत्व . त्या काळचे १९४० -४२ सालचे उच्च पदवी विभूषित  असलेले हे धडाडीचे तरुण,देशासाठी काहीतरी करण्याची त्यांच्या मनांत विलक्षण उर्मी होती. ऑर्डिनन्स फॅक्टरीतच नोकरीला असल्याने तिथलीच  सामग्री जमवून धाडसाने यांनी हातबॉम्ब   तयार केले.    थोडे  थोडके नाहीं तर अर्धा ट्रॅक भरून बॉम्बची सज्जता  झाली. आणि हा बॉम्बहल्ला करण्यासाठी कर्णिकांना  देशप्रेमी साथीदारही मिळाले. त्यांची नांव सांगायलाही अभिमान वाटतो, श्री. गोरे श्री दिक्षित श्री काळे, श्री जोगेश्वरी मंदिरातील’ व्यवस्थापक गुरव श्री भाऊ बेद्रेही त्यांना सामील होते. इतकंच काय देवीच्या मंदिरातही हे बॉम्ब लपवले होते. अखेर धाडसी खलबतं होऊन निर्णय ठरला. आणि कॅपिटलवर बॉम्ब टाकण्यांत ते यशस्वी झाले.  पण — पण हाय रे देवा ! कसा   कोण जाणे! दुर्देवाने ब्रिटीशांना सुगावा लागला आणि साथीदारासह श्री कर्णिक पकडले गेले.      फरासखान्यात ह्या देशप्रेमींना आणण्यांत आलं, आजचा सध्याचा मजूर अड्डा आहे नां ?तीच ती जागा!.पुराव्याअभावी बाकीचे साथीदार सुटले. पण.. पण श्री कर्णिक, मुख्य आरोपी म्हणून, डाव फसलयामूळे अडकले. पण ते डगमगले नाहीत. परिस्थितीचं  भान त्यांना आलं .. लघुशंकेसाठी परवानगी मागून ते बाजुला गेले. क्षणार्धात… क्षणार्धात.. खिशातली विषारी पुडी त्यांनी गिळून घेतली. चार पावलं चालल्यावर फरासखान्याच्या पहिल्या पायरीवरच ते,.. ते कोसळले…. आणि तिथेच त्या क्षणीच त्यांनी देशासाठी देहत्याग -केला.  तर मंडळी असा  आहे त्या पायरीचा इतिहास…..  मोडेन पण वाकणार नाही, हे ब्रीदवाक्य स्मरुन तो देशप्रेमी,हुतात्मा झाला. त्यांची आठवण स्मृतिचिन्ह म्हणून उभा केलेला स्तंभ आता जुना झालाय.   मध्यंतरी बराच काळ गेला  आहे .भास्कर दा.  कर्णिक ही अक्षरेही आता पुसट झालीत.त्यामुळे आतां – -हया हुताम्याचाही दुर्देवाने  पुणेकरांना विसर पडलाय.    संपली श्री भास्कर दा. कर्णिक  यांची  कहाणी . ज्यांना ही कथा माहित आहे. ते दगडूशेठ गणपती मंदिरातून बाहेर पडतात. डावीकडे वळून स्तंभापुढे उभे रहातात. क्षणभर विसावतात. आणि नतमस्तक होतात.

तर मंडळी आपणही या थोर हुतात्म्याला मनोभावे श्रध्दांजली देऊयात. 

कसलीच, काहीच माहिती नसलेली अशी ही वास्तू सध्या उपेक्षित ठरलीय.  कारण पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं आहे.  स्तंभावरील अक्षरे पण  पुसट झाली आहेत. तरीपण आपण श्री कर्णिकांच्या शौर्याला स्मरून,ह्या हुतात्म्याची आठवण म्हणून, स्तंभापुढे नतमस्तक होऊयात का ?      

धन्यवाद ..       

© सौ राधिका -माजगावकर- पंडित

पुणे.  

मो. 8451027554

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ दि रियल हिरो… लेखिका : सुश्री गुंजन गोळे ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

सुश्री गुंजन गोळे

? इंद्रधनुष्य ?

☆ दि रियल हिरो… लेखिका : सुश्री गुंजन गोळे ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

वयाच्या २१ व्या वर्षी सरकारी नोकरी, मानसन्मान, पैसाअडका असं सगळं स्वप्नवत असताना अचानक नोकरीचा राजीनामा देणाऱ्या मुलीला तुम्ही काय म्हणाल?…

कदाचित बेजाबदार किंवा लहरी म्हणाल. 

पण, समाज ‘ति’ला ‘हिरकणी’ म्हणतो आहे, ‘द रियल हिरोज’ या पुरस्काराने सन्मानित करतो आहे. 

पोलीस निरीक्षक पदाची नोकरी सोडून अनेक अनाथ, गरीब, मनोरुग्णांसाठी कार्य करणारी ‘द रियल हिरो’!

२७ डिसेंबर २०१६ ला ‘ती’ विवाहबंधनात अडकली. लग्नातील अनावश्यक खर्चाला फाटा देत तिने नोंदणी पद्धतीने लग्न करण्याचा निर्णय घेतला. 

लग्नाच्या दिवशी तिने व तिच्या जोडीदाराने रक्तदान केले. एवढंच नाही, तर त्यांच्या लग्नाला आलेल्या इतर मंडळीनी देखील रक्तदान केलं. 

सर्वात महत्त्वाचं म्हणजे लग्नाच्याच दिवशी या नवीन जोडप्याने ५ अनाथ मुलींचे पालकत्व घेऊन एक वेगळा आदर्श निर्माण केला. 

कोण ही ती? ही आहे गुंजन गोळे. महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यात एका सर्वसामान्य कुटुंबात जन्माला आलेली ही मुलगी आज तिच्या कर्तृत्वाने महाराष्ट्र गाजवते आहे. हो ! शब्दशः गाजवते आहे. 

गुंजनने अमरावतीत गवळीगड येथे महिला ढोल पथक सुरु केले आणि राज्यातील पहिले महिला ढोल पथक सुरू करण्याचा मान तिला मिळाला. या पथकात आज १५० महिला आहेत. 

तत्त्वज्ञानामध्ये एम.ए. केल्यानंतर गुंजनने स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यास सुरुवात केली. प्रचंड कष्ट आणि मेहनतीने अभ्यास केला. युपीएससीमधील Combined Defence Services ची परीक्षा तिने दिली आणि ती उत्तीर्ण देखील झाली. त्यानंतर तिने पोलीस उपनिरीक्षकपदासाठी परीक्षा दिली आणि तिने त्यातही यश मिळवलं. 

लहानपणी गुंजनने पाहिलेलं स्वप्न पूर्ण झालं. आईवडील आणि तिच्या स्वतःच्या कष्टाचं चीज झालं. 

गुंजन पोलीस निरीक्षक पदावर रुजू झाली. 

दिवसरात्र मेहनत करून मिळवलेल्या नोकरीचा गुंजनने एक दिवस राजीनामा दिला…! आश्चर्य वाटलं ना? 

पण, हा राजीनामा नोकरीचा कंटाळा आला, काम जमलंच नाही, वरिष्ठांचा दबाव आला म्हणून दिला नव्हता. राजीनामा देण्यामागे एक विचार होता. एक ध्येय होतं. वेगळ करून दाखवण्याची जिद्द होती. समाजसेवेची ओढ होती. हे सगळं करण्यासाठी गुंजनला प्रेरित करणारा प्रसंगही तसाच घडला होता. 

एके दिवशी रात्री ड्युटी आटोपून घरी परतत असताना गुंजनला एक मनोरुग्ण महिला अर्धानग्न अवस्थेत रस्त्याच्या कडेला दिसली. त्या महिलेच्या अंगावर जेमतेम कपडे होते. केस सुटलेले, अनेक दिवस अंघोळ न केल्याने ती विचित्र दिसत होती. त्यातच ती गरोदर आहे हे गुंजनच्या लक्षात आलं. नक्कीच कोणीतरी नराधमाने तिला आपल्या वासनेचं शिकार केलं असणार!

ते दृश्य बघून गुंजनला खूप रडू आलं. किळस वाटली. स्वत:ला माणूस म्हणवून घ्यायची लाज वाटायला लागली. गुंजनने सगळा धीर एकवटला. ती गाडीतून उतरली. त्या महिलेला घेऊन तिची योग्य ती सोय लावण्याचा तिने ठाम विचार केला आणि अजून एक विचार केला, तो म्हणजे अशा महिलांसाठी कार्य करण्याचा!

तिचा विचार पक्का झाला आणि अतिशय कष्टाने मिळवलेल्या नोकरीचा गुंजनने राजीनामा दिला. आधीची पोलीस निरीक्षक गुंजन आता रस्त्यांवरील मनोरुग्ण, वयस्क, अनाथ आजी-आजोबा, मुले यांचा आधार झाली. 

आता गुंजनचा दिवस पहाटे केव्हा सुरू होतो आणि केव्हा संपतो हे तिला देखील कळत नाही. ती अमरावती परिसरातील गरीब-गरजू मुलांना सैनिक भरतीचे प्रशिक्षण देते. स्पर्धा परीक्षांचे क्लासेस घेते. ढोल पथकाचा सराव घेते. महिला व मुलींना स्वरक्षणाचे धडे देते. साहसी खेळ जसे लाठी-काठी,  तलवारबाजी, दांडपट्टा हे शिकवण्याच्या कार्यशाळा महाराष्ट्रभर आयोजित करते. विशेष म्हणजे, या सगळ्यातून मिळणारे पैसे ती समाजकार्यात वापरते.

संध्याकाळी आपल्या दुचाकीवर बसून बिस्किटाचे पुडे, पाण्याच्या बाटल्या, छोटे हातरुमाल अशा विविध साहित्याने भरलेली बॅग घेऊन रस्त्यांवर कोणी उपाशी झोपले आहे का, थंडीत कुडकुडते आहे का? याचा ती शोध घेते आणि गरजुंना ते साहित्य देते. 

आजवर कित्येक नवजात बालकांना तिने मृत्यूच्या जबड्यातून वाचवले आहे. अनैतिक संबंधातून जन्माला आलेल्या आणि रस्त्यावर फेकून दिलेल्या अनेक नवजात शिशुंना तिने जीवदान दिले आहे. तिच्या पुढाकाराने अनेक मनोरुग्ण, कृष्टरोगी यांच्यावर उपचार सुरू आहेत. 

गुंजन एक उत्तम गिर्यारोहक देखील आहे! दरवर्षी १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला ती कळसूबाईचे शिखर सर करते आणि कळसूबाईवर तिरंगा फडकावते. आतापर्यंत १४ वेळा तिने हे शिखर सर केले आहे. 

गुंजनशी बोलताना तिचा बिनधास्त स्वभाव, समाजासाठी वाटणारी तळमळ शब्दाशब्दातून जाणवते. या 

मुलाखतीत तिने एकदाही स्वतःला मिळालेल्या कोणत्याही सन्मानांचा किंवा पुरस्कारांचा उच्चार देखील केला नाही. 

ज्याप्रमाणे पाच मुली दत्तक घेतल्या तशाच ५०० मुली दत्तक घेण्याचा गुंजनचा मानस आहे. महाराष्ट्रात एकही मनोरुग्ण, अनाथ, वयोवृद्ध रस्तावर बेवारस अवस्थेत राहू नये. असं तिला मनापासून वाटतं. पैशाअभावी किंवा वेळीच उपचार न मिळाल्याने जेव्हा एखादा माणूस दगावतो तेव्हा ती स्वतःला फार असहाय्य समजते. 

या सर्वाची दखल समाज कुठेतरी घेत होता. ८ जानेवारीला तिला ‘द रियल हिरोज’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 

तिच्यावर लिहिलेल्या ‘काही देणं लागतो’ या डॉ. सुभाष गवई यांच्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा नुकताच पुण्यभूमी तपोवन येथे पार पडला. तिला ‘हिरकणी’ पुरस्काराने देखील गौरवण्यात आले आहे. 

गुंजनने आतापर्यंत २ वेळा राष्ट्रीय रायफल शूटिंगमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले आहे. २६ जानेवारीच्या परेडमध्ये देखील तिला महाराष्ट्राचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे.

एकाच वेळी घर, समाज आणि राष्ट्र अशा तीनही आघाड्यांवर आपल्या कार्यकर्तृत्वाने एक वेगळी मुद्रा उमटवणाऱ्या गुंजनला  मन:पूर्वक शुभेच्छा !

लेखिका : सुश्री सुश्री गुंजन गोळे

संग्राहिका – सुश्री मीनल केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय पाचवा— कर्मसंन्यासयोग — (श्लोक ११ ते २० ) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय पाचवा— कर्मसंन्यासयोग — (श्लोक ११ ते २० ) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

कायेन मनसा बुद्ध्या केवलैरिन्द्रियैरपि ।

योगिन: कर्म कुर्वन्ति सङ्गं त्यक्त्वात्मशुद्धये ।।११।।

*

त्यागुनी आसक्ती  अंतःकरण शुद्धीस्तव कर्मा आचरत

स्वभाव जाणुनी देहमनबुद्धीचा कर्मयोगी कर्मा आचरत ॥११॥

*

युक्त: कर्मफलं त्यक्त्वा शान्तिमाप्नोति नैष्ठिकीम् ।

अयुक्त: कामकारेण फले सक्तो निबध्यते ।।१२।।

*

त्यागुनी कर्मफला कर्मयोगी शांति करितो प्राप्त

त्याग न करता फलाकांक्षेने लोभी बद्ध बंधनात ॥१२॥

*

सर्वकर्माणि मनसा संन्यस्यास्ते सुखं वशी ।

नवद्वारे पुरे देही नैव कुर्वन्न कारयन् ।१३।।

*

कर्मासी जो आचरितो समर्पित वृत्तीने 

नवद्वार नगरी स्थित  तो परमात्म स्वरूपाने॥१३॥

*

न कर्तृत्वं न कर्माणि लोकस्य सृजति प्रभु: ।

न कर्मफलसंयोगं स्वभावस्तु प्रवर्तते ।।१४।।

*

परमेशे ना निर्मिले कर्तृत्व कर्मफल वा कर्म

प्रकृती स्वभावे घडत जाते कर्त्या द्वारे कर्म ॥१४॥

*

नादत्ते कस्यचित्पापं न चैव सुकृतं विभु: ।

अज्ञानेनावृतं ज्ञानं तेन मुह्यन्ति जन्तव: ।।१५।।

*

ब्रह्मात्मा कधी न करतो पाप वा पुण्य

अज्ञानाने झाकोळूनी जाते जसे ज्ञान

जीवन हा निर्मल नितळ अथांगसा डोह

कर्म करिता मनुजा मात्र लोभवितो मोह ॥॥१५॥

*

ज्ञानेन तु तदज्ञानं येषां नाशितमात्मनः ।

तेषामादित्यवज्ज्ञानं प्रकाशयति तत्परम् ।।१६।।

*

तिमीर हटता अज्ञानाचा उजळे तत्वज्ञान 

सूर्यप्रकाशाने सृष्टी जैशी येत उजळून

अनावृत होता ज्ञान झुगारुन  झापड अज्ञान

विश्वात्म्याचे स्वरूप स्पष्ट मानव घेइ जाणून॥१६॥

*

तद्बुद्धयस्तदात्मानस्तन्निष्ठास्तत्परायणा: ।

गच्छन्त्यपुनरावृत्तिं ज्ञाननिर्धूतकल्मषा: ।।१७।।

*

तद्रुप बुद्धी तदाकार मन परमात्म्याशी अद्वैत

आत्मज्ञाने ते निष्पाप मोक्ष तयांना हो प्राप्त ॥१७॥

*

विद्याविनयसंपन्ने ब्राह्मणे गवि हस्तिनि ।

शुनि चैव श्वपाके च पण्डिता: समदर्शिन: ।।१८।।

*

विद्या-विनयाची ज्याने बाणविली अंगी वृत्ती

कुंजिर श्वा गो चांडाळाशी असते त्याची समदृष्टी ॥१८॥

*

इहैव तैर्जित: सर्गो येषां साम्ये स्थितं मन: ।

निर्दोषं हि समं ब्रह्म तस्माद् ब्रह्मणि ते स्थिता: ।।१९।।

*

इह जन्मी संसारजेता समदृष्टी जयाची स्थित

ब्रह्मासम ते दोषरहित ब्रह्माठायी असती स्थित ॥१९॥

*

न प्रहृष्येत्प्रियं प्राप्य नोद्विजेत्प्राप्य चाप्रियम् ।

स्थिरबुद्धिरसंमूढो ब्रह्मविद् ब्रह्मणि स्थित: ।।२०।।

*

मोद नाही प्रियप्राप्तीने ना उद्विग्नता अप्रियाने

स्थितप्रज्ञ ब्रह्मवेत्ता नित्य स्थित ब्रह्मी ऐक्याने ॥२०॥

अनुवादक : © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ हरवलेली रेल्वेगाडी… ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? इंद्रधनुष्य ?

☆ हरवलेली रेल्वेगाडी… ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆ 

हरवलेली रेल्वेगाडी.

Strange and interesting thing — 

— भारताच्या आसाम मध्ये ४३ वर्षापुर्वी हरवलेल्या रेल्वेगाडीची सुरस कथा. 

5 डिसेंबर 2019…

आशिया-आफ्रिका प्रदेशातील जंगलाचे मॅपिंग करणार्‍या  नासाच्या एका उपग्रहाने, भारताच्या आसाम मध्ये ईशान्येकडील एका घनदाट जंगलात काहीशी अस्पष्ट, धूसर अशी छायाचित्रे टिपली ज्यात एक लांबलचक वस्तू दिसत होती.

हे एखादे लपवून ठेवलेले आंतर-खंडीय बॅलिस्टिक मिसाईल (ICBM) असावे असा प्रथमदर्शनी त्यांना संशय आला व त्यांनी ती छायाचित्रे पेंटागॉनला संरक्षण खात्याकडे पाठवली.

त्यानंतर या क्षेत्रावर अनेक उपग्रह घुटमळू लागले, ज्याची नोंद आपल्या इस्रो, राष्ट्रीय तांत्रिक संशोधन विभाग आणि गुप्तचर संस्थांनी घेतली.

दरम्यान पेंटागॉनमधील रशियन आणि चीनी डबल एजंटांनी त्यांच्या देशांतील गुप्तचर संस्थेला, नासाने शोधलेल्या ‘ICBM ट्रेन’ बद्दल माहिती दिली आणि या देशांतील ‘रॉ’च्या एजंट्सकडून ही माहिती भारतात आली.

आता धोक्याची घंटा वाजू लागली. कोणी जाणीवपूर्वक तर हे कृत्य केले नसेल ना? देशाला बदनाम करण्यासाठी एखाद्या विदेशी सरकारचा तर यात हात नसेल ना?

भारतीय पातळीवर चौकशी सुरू झाली.

पंतप्रधान कार्यालय, संरक्षण गुप्तचर संस्था, राष्ट्रीय तपास संस्था, संरक्षण मंत्रालय आणि कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी यात सहभागी झाले.

मिलिटरी स्पेस कमांड आणि स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांड यांनी त्या ठिकाणी अशी कोणतीही क्षेपणास्त्रे ठेवली नसल्याचे सांगितले.

पण त्यानंतरची हवाई पाहणी आणि आपले उपग्रह, इंडियन एअरफोर्स आणि एव्हिएशन रिसर्च सेंटरने घेतलेले फोटो, या सर्वांनी पुष्टी केली की तेथे खरोखरच एक गाडी उभी आहे.

अखेर, राष्ट्रीय संरक्षण कमांडच्या कार्यालयातील एका वरिष्ठ गुप्तचर अधिकाऱ्यासह मार्कोस आणि गरुड पथकातील कमांडोंची एक टीम घटनास्थळी पाठवण्यात आली.

जे दृश्य समोर आलं, ते अगदीच अविश्वसनीय होतं!

ईशान्य रेल्वेची, एक संपूर्ण  रेल्वेगाडीच तिथे उभी होती…

मागे जाऊन शोध घेतला, तेव्हा समजलं ते असं…

16 जून, 1976…

रेल्वेच्या कामकाजाचा नेहमीसारखाच एक दिवस…

आसाममधल्या ‘तिनसुखीया’ या छोट्याश्या रेल्वे स्थानकावर सकाळी एक रेल्वे मालगाडी आली. तिनसुखीया हे गुवाहाटीपासून 480 किमी पूर्वोत्तर आणि अरुणाचल सीमेपासून सुमारे 80 किमी अंतरावर आहे.

प्लॅटफॉर्म तसा छोटाच, एकावेळी फक्त दोन रेल्वे गाड्या उभ्या राहतील, एवढाच!

रेल्वे गाडीतील सर्व माल उतरवल्यावर रेल्वे गाडी तिथून हटवणं भाग होतं, कारण पुढील अर्ध्या तासात त्याच रेल्वे ट्रॅकवरून गुवाहाटीला जाणारी एक्सप्रेस येणार होती.

रेल्वे इंजिन ड्रायव्हरला, रेल्वेगाडी सायडिंगला लावण्याचा आदेश दिला गेला.

पण सर्वात जवळचं सायडिंग होतं तिथून 3 किलोमीटर लांब. सायडिंग साठी ती रेल्वेगाडी तिथपर्यंत गेली. 16 जून 1976 रोजी सकाळी 11:08 वाजता गाडी तेथे पोहोचल्याचे रेल्वेच्या नोंदीवरून दिसून आले. 

डॅनियल स्मिथ, रेल्वेइंजिन चालक ड्रायव्हरने , सायडिंग ठिकाणी रेल्वेगाडी  पार्क केली,  व   तो परत चालत चालत चालत  पुन्हा  ‘तिनसुखीया रेल्वेस्थानकावर’  आला.

आणि..

त्याच दिवशी अर्ध्या तासातच  म्हणजे सकाळी 11:31 वाजता मुसळधार पाऊस आला आणि काहीच तासांत तेथे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. रेल्वे बोर्डाने केलेल्या चौकशीतून असे दिसून आले की, त्यावेळेस स्थानिक रेल्वे कर्मचारी वाहतूक सातत्य राखण्यात, ट्रॅकची दुरुस्ती करण्यात आणि पुराच्या समस्येला तोंड देण्यात पूर्णपणे गुंतले होते. जवळपास संपूर्ण रेल्वेस्टेशन 5 ते 6 फूट पाण्यात बुडाले होते.

येणाऱ्या  सर्व रेल्वेगाड्या  जागच्या जागी  ठप्प झाल्या होत्या.  गावकऱ्यांच्या मदतीने  रेल्वे प्रशासनाने  त्यातील सर्व प्रवाशांना खाली उतरवले व वेगवेगळ्या मार्गांनी त्यांची जाण्याची सोय केली.

या सर्व गडबडीत बरेच दिवस निघून गेले. रेल्वे स्टेशनमास्तरांची बदली झाली.  पुढील काही महिन्यांत बरेचसे रेल्वे कर्मचारीही बदलले.

आपली एक रेल्वेगाडी सायडिंगला उभी आहे, याचा सर्वांना विसर पडला.

सायडिंगची जागाही तशी निर्जन!

लोकांचं त्या बाजूला फारसं जाणं येणंही नव्हतं. हळूहळू झाडांनी संपूर्ण परिसर व्यापला. क्वचितच वापरल्या जाणार्‍या साइडिंगकडे जाणार्‍या रेल्वेट्रॅकचे अवशेष;  जे पुरात वाहून गेले  होते;  लवकरच झाडे झुडुपे आणि  तणांच्या जंगलात   रेल्वेगाडी  दिसेनासे झाले.  तेथील साप, पक्षी आणि वन्य प्राण्यांना आयतंच एक घर मिळाले होते,  त्यांचा मुक्त वावर तेथे रेल्वेगाडीत होता.

बराच काळ लोटला. तेथील उरले सुरले  जुने रेल्वे कर्मचारीदेखील निवृत्त झाले, तर काहींचे निधन झाले.  या  सायडिंग बाजुला डोंगरात लावलेल्या  रेल्वेगाडीची  आठवण   कोणालाच  नव्हती. 

डॅनियल स्मिथ, रेल्वेइंजिन चालक, तिनसुखीयाच्या घटनेनंतर, तीन महिन्यातच  सप्टेंबर 1976 मध्ये, भारतीय रेल्वे सोडून तो ऑस्ट्रेलियाला स्थलांतरित झाला.

नासाच्या उपग्रहाने टिपलेल्या त्या चित्राने त्या  सायडिंग रेल्वेगाडीचा  तर शोध लागलाच, पण यासाठी कामाला लागलेल्या सर्व संरक्षण पथकांनीदेखील सुटकेचा निःश्वास टाकला.

खरोखरच जर तिथे काही आंतर-खंडीय बॅलिस्टिक मिसाईल सापडले असते तर,  साऱ्या जगाला तोंड द्यावे लागले असते.

सलग 43 वर्षे ह्या  सायडिंग लावलेल्या रेल्वेगाडीबद्दल भारतात कोणालाच काही माहीत नव्हते,  हे जगातले कितवे आश्चर्य?

आहे का नाही अजब कारभार !!!

लेखक :  सौरभ रत्नपारखी

संग्राहक : अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈



मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “एक अद्भुत अनुभव – नामस्मरणाच्या शक्तीचा…” – लेखक : डॉ. संजीव दात्ये ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

? इंद्रधनुष्य ?

☆ “एक अद्भुत अनुभव – नामस्मरणाच्या शक्तीचा…” – लेखक : डॉ. डी. जी. लवेकर ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

— अनेस्थेशियाशिवाय शस्त्रक्रिया 

“We dare.. we care“

हे वाक्य खरेतर सर्व डॉक्टरांच्या बाबतीत तंतोतंत लागू पडते. आम्ही सर्वजण रुग्णाचा जीव वाचवण्यासाठीच नेहमी प्रयत्न करीत असतो. परंतु पेशंटच्या आग्रहाखातर काही वेळेस आम्हाला अधिकच धैर्य दाखवून उपचार करावे लागतात. असाच एक मला आलेला अनुभव येथे आपणास कथन करीत आहे.

सुमारे वीस वर्षांपूर्वीची गोष्ट असेल आमच्या गुरुदेव रानडे संप्रदायातील एक निष्ठेने नामसाधना करणारे ज्येष्ठ व श्रेष्ठ साधक श्री दादा तेंडुलकर मानेवर एक मोठे काळं पुडीबेंड (Carbuncle with Abscess) झाल्यामुळे सुश्रुत हॉस्पिटल चिंचवड येथे डॉक्टर कानिटकरांकडे ऍडमिट होते. डॉक्टर कानिटकर यांनी त्यांच्या सर्व तपासण्या करून मला सर्जन म्हणून त्यांचे ऑपरेशन करण्यासाठी बोलावले होते. मी त्यांना तपासले व बेंण्ड अर्थातच खूप मोठे असल्यामुळे त्यांना शस्त्रक्रियाही पूर्ण भूल ((General Anaesthesia) देऊन करावी लागेल असे सांगितले. मानेचा बराच भाग खराब झाल्याने व त्यामध्ये पू (pus) झाल्याने लोकल अनेस्थेशिया देणे सुद्धा शक्य नव्हते. 80 वर्ष वय,आटोक्यात नसलेला मधुमेह, ब्लड प्रेशर,वगैरे सर्व गोष्टी लक्षात घेतल्यास भूलेमध्ये व शस्त्रक्रियेत असलेला सर्व धोका त्यांना व  नातेवाइकांना  समजावला. जखम भरण्यास वेळ लागेल हे देखील सांगितले होते.

“डॉक्टर तुम्ही माझे ऑपरेशन भूलेशिवाय निर्धास्तपणे करावं ..  मला काही होणार नाही, मी मान देखील हलवणार नाही. मला भूलही नको आणि वेदनाशामक इंजेक्शनही नको. ऑपरेशन सुरू करण्यापूर्वी मात्र तुम्ही मला ‘ आता मी सुरु करणार आहे ‘ असे सांगा.  मग मी अगदी स्तब्ध राहीन आणि माझे नामस्मरण चालू ठेवीन “ असे त्यांनी आम्हाला निक्षून सांगितले.

डॉक्टर अस्तिक कानिटकर यांसारख्या अत्यंत अनुभवी भूलतज्ञ डॉक्टरांकडूनही भूल घेण्यास ते अजिबात तयार नव्हते अथवा कोणतेही इंजेक्शन घेण्यास तयार नव्हते. बेंड खूप मोठे होते व त्यांना दुखल्यास आणि त्यांनी मान हलवल्यास जवळपासच्या मानेच्या महत्वाच्या नसा, रक्तवाहिन्यांना इजा होण्याचा धोका होता. कितीही समजावून सांगितले तरी दादा अनेस्थेशियासाठी तयार होईनात. तेव्हा सर्व धोका पत्करून High risk consent घेऊन इमर्जन्सी सर्व इंजेक्‍शन वगैरे तयार ठेवून त्यांना ऑपरेशनसाठी टेबलवर घेतले. एका कुशीवर त्यांना झोपवले. पेंटिंग, ड्रेपिंग, वगैरे सर्व तयारी करून ‘ दादा मी आता ऑपरेशन सुरू करतो ‘असे सांगितले.

“ ठीक आहे. तुम्ही सर्व ऑपरेशन निर्धास्तपणे व्यवस्थित करा व संपले की मला सांगा. तोपर्यंत मी मान हालवणार नाही “  असे म्हणून त्यानी डोळे मिटून त्यांचे नामसाधन शांतपणे चालू ठेवले. त्यांचे बेंड कापून त्यातील सर्व पू व खराब भाग काढून टाकून नंतर औषधांची पट्टी भरेपर्यंत जवळपास अर्ध्या तासाने आता त्यांना ऑपरेशन संपले आहे असे सांगितले. संपूर्ण ऑपरेशन संपेपर्यंत डॉक्टर कानेटकर मॉनिटरवर त्यांचे parameters पहात होते, एकदाही त्यामध्ये कोणताही बदल झाला नाही. तसेच पेशंटला कोणतेही वेदनाशामक अथवा भुलीचे इंजेक्‍शन द्यावे लागले नाही.

“ संपले का ऑपरेशन ? हरकत नाही “ असे सांगताना त्यांच्या डोळ्यात ना अश्रू होते ना चेहऱ्यावर दुःखी भाव होते. ते सर्व पाहून आम्ही दोघेही नतमस्तक झालो. नंतरच्या ड्रेसिंगच्या वेळेस देखील त्यांनी कधीही हू का चू केली नाही.

सद्गुरूंकडून मिळालेल्या सबीज नामाचे अत्यंत निष्ठेने, चिकाटीने, सातत्याने अंतकरणापासून साधन केल्यास गुरुकृपेने विज्ञानाला देखील अगम्य असलेल्या सुप्त शक्ती साधकाला प्राप्त होतात व ईश्वर साक्षात्कारही होतो असे श्री गुरुदेवांनी व आपल्या संतांनी अनुभवातून सांगितलेल्या गोष्टींची अशी त्यांच्या शिष्यांकडून प्रचिती मिळते तेव्हा आपली श्रद्धा नक्कीच द्विगुणित होते. संत रामदासांनी दासबोधात नामस्मरण भक्ती समासात म्हटलेच आहे —

नामे विघ्ने निवारती , नामे संकटे नासती,                  

नामे होय उत्तम गती अंतकाळी.

……I feel that we doctors should accept —–   

—  We dare..We care & HE (God) CURES.. 

लेखक : डॉक्टर संजीव दात्ये

जनरल सर्जन,  चिंचवड.

लेखक : डॉ. डी. जी. लवेकर

संग्राहक : श्री मोहन निमोणकर

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈