मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत !” –  भाग- १  ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ “आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत !” –  भाग- १  ☆ श्री संभाजी बबन गायके 

 

नायब सुभेदार संतोष राळे

त्याला त्यांनी एकदा नव्हे, दोनदा नव्हे… नऊवेळा माघारी धाडले! तरीही तो दहाव्यांदा परतून आला. त्याला आयुष्यात दुसरं काहीच प्यारं नव्हतं…. फक्त लढाई करायची होती! छत्रपती शिवरायांच्या जन्माने आणि कर्माने पावन झालेल्या भूमीत एका शेतक-याच्या पोटी जन्मलेल्या या मुलाच्या मनात एक गोष्ट निश्चित होती…. झुंज घ्यायची… परिणाम हा शब्द त्याच्या कोशात नव्हताच तर भीती हा शब्द तरी कसा असेल? दहावी उत्तीर्ण झाल्यावर कनिष्ठ महाविद्यालयासाठी गावातून तालुक्याच्या गावी जावे लागले तर तिथे हुतात्मा बाबू गेनू यांचे स्मारक नजरेस पडायचे…. असे काही तरी हातून घडले पाहिजे… त्याचा विचार पक्का झाला!

त्याने या विचाराला कृतीची जोड खूप आधीपासून द्यायला आरंभ केला होताच. शेतात राबायचं, तालमीत कसायचं. शाळेत जाऊन-येऊन आठ दहा मैल पळतच यायचं… गोटीबंद शरीर तयार होत होतं. शरीराचं वजन उंचीला मागे टाकून पुढे धावत होतं… काही पावलं.

ते वर्ष १९९१-९२ होतं. भारतीय लष्करात वर्षातून अनेक वेळा भरती कार्यक्रम आखले जात. सैनिक म्हणून युवकांना भरती करून घेताना कडक मापदंड असतातच. शारीरिक आणि वैद्यकीय तपासण्या अत्यंत काटेकोर असतात. शैक्षणिक कौशल्यही तपासले जाते.

आपले हे पहिलवान पहिल्या भरतीला पोहोचले आणि सर्व कसोट्या लीलया पार करते झाले… धावणे, उंच उडी, लांब उडी, पुल-अप्स इत्यादी इत्यादी मध्ये पहिला किंवा फार फार तर दुसरा क्रमांक…. पण एक गोष्ट आडवी आली….. उंची आणि वजन यांचा मेळ बसेना. उंची तर कमी किंवा जास्त करता येण्यासारखी नव्हती…. मग वजन कमी करणे गरजेचे झाले. प्रयत्न क्रमांक दोन ते नऊ मध्ये दरवेळी दीड दोन किलो वजन कमी व्हायचे पण तरीही ते भरतीच्या निकषांच्या जवळ जाऊन थांबायचे…. रिजेक्टेड शिक्का ठरलेला!

दहाव्या वेळी मात्र दैव काहीसे प्रसन्न झाले… चिकाटी पाहून! नेहमीप्रमाणे सर्वच कसोट्या पार पडलेल्या… आणि भरती अधिकारी म्हणाले…. नहीं होगा! त्याच वेळी मात्र तेथे उपस्थित असलेल्या जबाबदार वरिष्ठ अधिका-याची नजर या पहिलवान गड्यावर पडली… चेहरा ओळखीचा वाटत होता… नऊ वेळा येऊन गेलेला पोरगा कसा विसरला जाईल? त्या साहेबांनी त्यांच्या अधिकारात या गड्याला लष्करात घेतलं! काहीच महिन्यांत अंगावर लष्कराची वर्दी घालायला मिळणार होती. बॉम्बे इंजीनियरिंग ग्रुप मध्ये सैनिक असलेले शरीरसौष्ठवपटू चुलते श्री. रमेश बळवंत यांच्या नंतर लष्करात भरती होणारा त्यांच्या परिसरातला हा केवळ दुसराच तरुण ठरणार होता.

बेळगावच्या मराठा लाईट इन्फन्ट्री प्रशिक्षण केंद्रांत पाऊल ठेवले तोच प्रवेशद्वारात छत्रपती शिवरायांचा पुतळा दृष्टीस पडला आणि तिथे प्रशिक्षण घेत असलेल्या जवानांनी केलेला बोल छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय! हा घोष कानी पडला…. आणि खात्री पटली की आपली पावले योग्य मार्गावर पडत आहेत. पण इथेही उंची वजन गणित आडवे आले. इतर सर्व बाबी परिपूर्ण असल्या तरी देहाचे वजन काहीसे मर्यादेच्या पलीकडे होते. वैद्यकीय अधिकारी म्हणाले…. नहीं होगा! पण भारतीय लष्कराला एक शूर, निधडा जवान लाभण्याचा योग होता. दहाव्या भरतीच्या वेळी भेटलेले वरिष्ठ अधिकारी येथेही देवदूत म्हणून उभे राहिले….. संतोष तानाजीराव राळे हे आता मराठा लाईट इन्फन्ट्री मध्ये प्रशिक्षण घेऊन देशरक्षणासाठी स्वीकारले गेले! यथासांग प्रशिक्षण पार पडले…. कसम परेड झाली!

त्या साहेबांनी विचारले… कोणत्या बटालियनमध्ये जाणार? याची तर काहीही माहिती नव्हती! संतोष म्हणाले…. जिथे प्रत्यक्ष लढायला मिळेल तिथे पाठवा, साहेब! साहेब मनात हसले असतील… त्यांनी संतोष राळे यांना ७, मराठा मध्ये धाडले! ही पलटण सतत सीमेवर तैनात असते… अर्थात शत्रूच्या अगदी नाकासमोर… मर्दुमकी गाजावण्याची संधी मिळण्याची शक्यता अधिक! संतोष मोठ्या आनंदाने कर्तव्यावर निघाले. पहिली नेमणूक भारत-पाकिस्तान काश्मीर सीमेवरील पूंछ सेक्टर येथे मिळाली… शत्रू तिथून अगदी नजरेच्या टप्प्यात दिसत होता. इथे काही महिने काढले कसे बसे.. पण काहीच घडेना. रात्रभर दबा धरून बसायचे पण शत्रू काही गावत नव्हता… रायफल शांत शांत असायची हातातली! मग देशाच्या काही सीमांवर बदली झाली… भूतान देशात जाऊनही चीन सीमा राखायला मिळाली… पण रायफल अजून शांतच होती… त्यामुळे संतोष यांना अस्वस्थ वाटू लागायचं…. सैनिक आणि लढाई या एका नाण्याच्या दोन बाजू…. हा रुपया बंदा असला तरच खणकतो. काहीच वर्षांत कारगिल घडले. पण याही वेळी पुढे जायला मिळाले नाही. पण कारगिल युद्धविराम झाल्यानंतरही एका पाकिस्तान पुरस्कृत अतिरेकी गटाने भारताच्या काही चौक्या त्यांच्याच ताब्यात ठेवल्या होत्या. यांपैकी एक चौकी परत मिळवण्याच्या कामगिरीमध्ये मात्र संतोष यांना सहभागी होता आले होते! वाघाला शिकारीची चटक लागली होती! पण पुढे बरीच वर्षे तशी शांततेमध्ये व्यतीत झाली…. संतोषराव पुन्हा अस्वस्थ झाले.. त्यांचे बाहू तर फुरफुरत होतेच.

२००७ वर्ष होते. त्यांच्या जवळच उरी सेक्टर… मच्छिल येथे ५६, आर. आर. अर्थात राष्ट्रीय रायफल्स बटालियन कार्यरत होती. ही बटालियन त्यांच्या अतिरेकीविरोधी यशस्वी अभियानामुळे सतत चर्चेत असायची! मला आर. आर. मध्ये जायचे आहे… घातक कमांडो कोर्स यशस्वीरीत्या पूर्ण केलेल्या जवान संतोष यांनी हट्ट धरला… दोनेक वर्षांनी वरीष्ठांनी सांगितले… जाव! आणि मग हा मर्द गडी प्रत्यक्ष लढाईच्या मैदानात उतरला…. आणि रणभूमीने संतोष राळे यांची आर्जवे मान्य केली!

वर्ष २००८. अठरा अतिरेकी भारतात घुसणार आहेत.. अशी पक्की खबर लागली. त्यानुसार त्यांच्यावर चालून जाण्याची योजना तयार झाली. वरिष्ठ अधिका-यांनी दोन तुकड्या तयार केल्या. मागील तुकडीत संतोष साहेब होते. एक तुकडी पुढे दुस-या मार्गाने निघाली होती. त्या अठरा जणांना भारतीय हद्दीत प्रवेश करण्यासाठी जंगलाने वेढलेला एक रस्ता वापरणे अनिवार्य होते. या रस्त्यावर एक नाला होता आणि त्या नाल्यावर एक लाकडी पूल होता. नाल्यातील पाणी प्रचंड थंड असल्याने नाल्यात उतरून नाला पार करणे कोणालाही शक्य नव्हते. त्यानुसार त्या रस्त्याच्या आसपास सापळा लावून संतोष आणि त्यांचे सहकारी सैनिक दबा धरून बसले. पहाटेचे चार वाजले पण अतिरेकी दिसेनात. थंडीमुळे सैनिकांची शरीरे आकडून गेलेली.. तशाही स्थितीत बसल्या बसल्या शारीरिक व्यायाम करून शरीरांत उष्णता आणण्याचे प्रयत्न सुरु होते. पण उजाडले तरी अतिरेकी त्या लाकडी पुलावरून आले नाहीत. ज्या बाजूला आर. आर. ची तुकडी होती त्या बाजूला अचानक गोळीबाराचे आवाज येऊ लागले.. काही समजेना!

जसे आपले खबरी होते तसे अतिरेक्यांचेही खबरी होतेच. किंबहुना आपल्या खबरीने हेतुपुरस्सर चुकीचा दिवस सांगितल्याची दाट शक्यता होती… एक दिवस (किंबहुना एक रात्र) आधीच ही श्वापदं आपल्या घरात घुसली होती! पहिला डाव आपल्या विरुद्ध गेला होता. वरीष्ठांनी संतोष यांना माघारी यायला सांगितले. हे अतिरेकी आपल्या दुस-या संरक्षक फळीपर्यंत पोहोचण्यात यशस्वी ठरले होते. पहा-यावर असलेल्या जवानांना त्यांची चाहूल लागली…. भयावह धुमश्चक्री झाली. ४५, राष्ट्रीय रायफल्स चे कर्नल जोजन थॉमस साहेबांनी यांतील सहा अतिरेकी टिपले.. २२ ऑगस्ट २००८चा तो दिवस होता… पण यांत जोजन साहेब आणि दोन जवान धारातीर्थी पडले. उर्वरीत अतिरेकी तिथून पाकिस्तानी सीमेकडे पळाल्याचे वृत्त हाती आले! या पळपुट्यांची आणि संतोष यांच्या तुकडीची गाठ पडायची दाट शक्यता होती. आणि तशी ती पडलीही! चार तासांच्या पायापीटीनंतर संतोष साहेब मागे इच्छित स्थळी पोहोचले. लख्ख उजाडले होते… आठ-सव्वा आठ वाजले असावेत. माघारी येण्याच्या मार्गावर असलेल्या संतोष राळे यांच्या पथकाला माघारी न येता तिथून पळून जाणा-या अतिरेक्यांच्या मार्गात दबा धरून बसण्याच्या व त्यांना ठार मारण्याच्या कामगिरीवर नेमण्यात आले. आधीच्या रात्री प्रचंड थंडीत उघड्यावर झालेले जागरण आणि घडलेला उपवास यामुळे थकलेल्या जवानांना संतोष राळे यांनी माघारी पाठवले आणि नवीन कुमक मागवली… त्यात घातक तुकडीचे काही कमांडोज होते. प्रचंड गोळीबारामध्ये आपल्या सैनिकांनी जड युद्ध साहित्य जीवाचा धोका पत्करून पोहोचवण्याची कामगिरी यशस्वी केली.

 – क्रमशः भाग पहिला   

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘चैतराम पवार…’ – लेखक श्री मिलिंद थत्ते ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆

सुश्री सुलू साबणे जोशी

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘चैतराम पवार…’ – लेखक श्री मिलिंद थत्ते ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी

चैतराम पवार…       

आपल्या अगदी जवळच्या माणसांचे, मित्रांचे जाहीर कौतुक करण्याचे निमित्त मिळाले की सोडू नये. चैत्राम पवार म्हणजे चैत्रामभाऊंना पद्मश्री जाहीर झाल्याचे काल वर्तमानपत्रात वाचून कळले. तसे त्यांना यापूर्वीही जे जे पुरस्कार मिळाले, ते त्यांच्याकडून कधीच कळले नव्हते. किंबहुना बारीपाड्यात त्यांच्या घरातल्या एका कोनाड्यात ते पुरस्कार गप-गुमान अंग चोरून बसलेले दिसत. मी २००० साली पहिल्यांदा बारीपाड्यात गेलो होतो. नंदुरबारच्या डॉ. गजानन डांग्यांनी साक्रीहून कोणाची तरी दुचाकी उधार घेतली आणि आम्ही दोघे बारीपाड्यात गेलो. गेलो म्हणजे ती दुचाकी अलिकडच्या एका गावात ठेवली आणि मग चिखल तुडवत पाऊस चुकवत बारीपाड्यात पोचलो. भाऊंच्या घरी चुलीजवळ बसून कोरडे झालो आणि घरच्या गुळाचा कोरा चहा प्यायलो. तिथपासून गेली २४ वर्षे मी चैत्रामभाऊंना ओळखतो-पाहतो आहे.

पहिल्या भेटीनंतर मी एका साप्ताहिकात त्यांच्या कामाबद्दल, बारीपाड्याबद्दल लेख लिहीला. तोच पहिला लेख होता, असं डॉ. फाटकांकडून नंतर मला कळलं. त्या वेळी ऑलरेडी बारीपाड्याच्या गावकऱ्यांनी श्रमदानाने शे-दोनशे बांध घातले होते, जंगल राखून पाणी अडवून गाव टँकरमुक्त केला होता, पाच ऐवजी चाळीस विहीरी झाल्या होत्या, स्थलांतर करण्याऐवजी गावातच राहून वर्षाला दोन पिके काढायला सुरूवात झाली होती. पुरूषांनी दोन मुले झाल्यानंतर नसबंदी करून घेतली होती. एकही कुटुंब दारिद्र्यरेषेखाली नव्हते. आणि वनव्यवस्थापनाच्या पुरस्काराच्या रकमेतून गूळ निर्मितीसाठी गुऱ्हाळ सुध्दा गावाने सुरू केले होते. हे सगळे होऊनही बारीपाड्याची कुठेही प्रसिद्धी नव्हती.

पुढच्या २४ वर्षात बारीपाड्याने विकासाचे अनेक पल्ले ओलांडले, नवे मापदंड निर्माण केले. भोवतालच्या ५०हून अधिक गावांना सामुदायिक वन हक्क मिळवून द्यायला मदत केली आणि तिथल्या वनसंवर्धनात मोठ्या भावाची भूमिका घेतली. अनेक पुरस्कार मिळाले. गावाची कीर्ती दुमदुमली. या सर्वांबद्दल आता गूगल वर शोधलंत तरी खूप काही वाचायला, पहायला मिळेल.

मला काही वेगळं या निमित्ताने सांगावंसं वाटतंय्…   बारीपाड्याबद्दल नाही, या चैत्राम नावाच्या माणसाबद्दल.

तुम्ही त्यांच्या तोंडून बारीपाड्याचा विकास प्रवास ऐकलात, तर असं वाटतं की हा माणूस या प्रवासात फक्त साक्षीभावानंच होता. ज्या ज्या लोकांनी थोडीशी का होईना बारीपाड्याला मदत केली असेल, त्या प्रत्येकाचं नाव घेऊन हे श्रेय त्यांचे – असेच चैत्रामभाऊ सांगतात. आणि यात काहीही चतुराई वगैरे नसते, हे अतिशय प्रांजळपणे आणि निर्व्याज मनाने ते सांगत असतात. डॉ. आनंद फाटक, डॉ. श्री. य. दफ्तरदार यांची प्रचंड गुंतवणूक आणि मार्गदर्शन बारीपाड्याच्या प्रयोगांत होते. त्यांचे नाव चैत्रामभाऊ घेतातच, पण त्यापुढेही अशी कित्येक माणसांची नावे येतात, की ज्यांच्या हे गावीही नसेल की आपल्या किरकोळ भूमिकेलाही या माणसाने मोलाचं मानलं आहे. ‘मी तो हमाल भारवाही’ ही भूमिका इतक्या सच्चेपणाने जगताना मी कोणाला पाहिलेलं नाही.

एक उपजिल्हाधिकारी मला म्हणाले होते, हा माणूस इतका निरहंकारी आहे, हा खरंच नेता आहे का? 

दुसरा गुण सांगावा तर असा की, गावातली इतर घरं आणि यांचं घर यात काहीही मोठा फरक नाही. मी अनेक आदर्श गावांचे नेते पाहिलेत, त्यांची घरं आणि त्यांच्याभोवतीचं वलय पाहिलं आहे. इथे असं काही वलय नाही. गावात वावरताना चैत्रामभाऊ आणि गावातले इतर कोणीही सारखेच वावरतात. वयाने वडील माणूस सहज चैत्या म्हणून हाक मारतो.

बारीपाड्यात आमच्या जव्हारच्या गावातल्या कार्यकर्त्यांची सहल घेऊन गेलो होतो. तेव्हाच्या गावात शिरल्यावर पहिल्या प्रतिक्रिया अशा होत्या – अरे यांची घरे तर आपल्यापेक्षा लहान आणि अगदीच साधी दिसतायत. इथे काय बघायला आलो आपण? आणि पुढच्या काही तासांत या प्रतिक्रिया बदलत गेल्या. अरे, यांच्याकडे वर्षभर शेतीला पाणी आहे, जंगलात वारेमाप साग आहे, इथून माणसं बाहेर कामाला जात नाहीत, पिकं तरी किती? 

बारीपाड्याला विकासाची वेगळी दृष्टी आहे. अस्सल भारतीय, स्वतःत समाधान मिळवणारी दृष्टी. स्वयंपूर्ण, स्थिर, शांत जीवनाची दृष्टी. हीच विशेषणं चैत्रामभाऊंची आहेत.

जे अस्तित्वात असतं, ते सत्य – म्हणजे उलटं करून सांगायचं तर – ‘सत्य असतंच!’ ते सांगावं, घडवावं लागत नाही. चैत्रामभाऊंच्या जगण्यात, बारीपाड्याच्या विकासात – ते सत्य आहे.

आताच्या जगातला झगमगाटाचा पडदा दूर सारला, की ते सत्य दिसतं. ईशावास्योपनिषदातली हीच प्रार्थना आहे.

तसं सत्य सहज जगण्यात सापडलेला माणूस ते सांगायला, प्रचारायला धडपडत नाही. चैत्रामभाऊंचं कुठे भाषण ठेवायचं म्हटलं की पंचाईत असायची. कारण यांचं भाषण २-३ मिनिटात संपायचं. त्यामुळे मुलाखत ठेवायची, म्हणजे जितके प्रश्न येतील तितकी उत्तरं यायची. बरं त्यात एकदाही, चुकूनही ‘मी’ येत नाही, ‘आम्ही’ सुद्धा येत नाही, सतत ‘आपण’ असतो. ऐकणाऱ्यांना सुद्धा त्यांनी त्यात घेतलेलं असतं. तुम्ही काही केलं नसलंत, तरी तुमच्या सदिच्छा आम्हाला उपयोगी पडल्याच – अशी सच्ची भावना असते.

यापुढेही मला वाटतं की, एखाद्या जाहीर कार्यक्रमात त्यांच्या नावापुढे पद्मश्री लावून लोक बोलू लागले, की चैत्रामभाऊ बसल्या खूर्चीतच अवघडतील. आणि कधी एकदा मी खाली उतरतो आणि मातीवर पाय टेकतो अशी भावना स्पष्ट दिसेल.

“आपल्याला सगळ्यांना पद्मश्री मिळाली आहे” असं वाटून घेण्याचाच हा क्षण आहे! अभिनंदनाचे लेख-पोस्ट काही लिहीले तरी तो माणूस काही अंगाला लावून घेणार नाही!

लेखक : श्री मिलिंद थत्ते

 Phones: +91. 9421564330 / Office: +91. 253. 2996176

प्रस्तुती : सुश्री सुलू साबणे जोशी 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “पराधीन नाही पुत्र मानवाचा” ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

? इंद्रधनुष्य ?

☆ “पराधीन नाही पुत्र मानवाचा☆ श्री जगदीश काबरे ☆

अवैज्ञानिक सिद्धांत लादू पाहणाऱ्या धर्ममार्तंडांच्या विरोधात उभा राहिलेला पहिला वैज्ञानिक गॅलिलिओ यांची ३००वी पुण्यतिथी ठरलेला ८ जानेवारी हा स्टीफन हॉकिंग यांचा जन्मदिवस आणि १४ मार्च हा आधुनिक विज्ञानेश्वर अल्बर्ट आईन्स्टाईन यांचा जन्मदिन हाच स्टिफन हॉकिंग यांचा मृत्यूदिन! 

हॉकिंग यांना ‘का’ या प्रश्नाने आयुष्यभर पछाडले. खरेतर सामान्यही अनेकदा या ‘का’ प्रश्नास सामोरे गेलेले असतात. परंतु या सर्वसामान्यांना आणि हॉकिंग यांना पडणाऱ्या ‘का’ या प्रश्नाचा फरक असा की, जनसामान्य आयुष्याच्या रेट्यात या ‘का’ प्रश्नाला शरण जातात; तर हॉकिंगसारखा प्रज्ञावंत त्या ‘का’स पुरून उरतो.

पृथ्वीचा जन्म मुळात झालाच का? झाला असेल तर तो कशामुळे झाला? ज्याचा जन्म होतो त्याचा मृत्यू अटळ असतो. मग या पृथ्वीलाही मृत्यू आहे का? असल्यास तो कधी असेल? आणि मुख्य म्हणजे तो कशाने असेल? अशा अन्य काही पृथ्वीही आहेत का? त्यांना शोधायचे कसे? या आणि अशा प्रश्नांचा, काळाचा शोध घेणे हे हॉकिंग यांच्या जन्माचे श्रेयस आणि प्रेयसही होते.

स्टीफन हॉकिंग हा जगातला सर्वश्रेष्ठ वैज्ञानिक म्हणून मान्यता पावलेला, आइन्स्टाइनच्या पंक्तीला बसू शकेल असा माणूस. त्याच्यावर अगदी विशीतच मोटर न्यूरॉन डिसीज झाल्यामुळे त्याला व्हीलचेअरला खिळण्याची पाळी त्याच्यावर आली. या रोगात एकेका अवयवावरचा मेंदूचा ताबा नष्ट होत जातो. शेवटची चाळीसेक वर्ष त्याच्या मानेखालच्या सर्व अवयवांवरचा ताबा गेलेला आणि बोलताही येत नसलेल्या अवस्थेत तो जगला. म्हणजे चालत्याबोलत्या सामान्य मनुष्यापासून ते जवळपास निव्वळ विचार करणारा मेंदू – अशा शारीर ते बौद्धिक अवस्थेपर्यंत त्याचा प्रवास झाला. अशा स्थित्यंतरातही त्याने देवाची करुणा न भाकता आपल्या वैचारिक वैभवाने विश्वरचनाशास्त्रातली, कृष्णविवरांची, काल-अवकाशाची कोडी सोडवली. त्याच्या अनेक नव्या उत्तरांनी नवीनच प्रश्नांची दालनं उघडली.

अत्यंत खडतर आयुष्य जगावे लागत असताना कोणत्याही टप्प्यांवर त्यांची विज्ञाननिष्ठा कमी झाली नाही की अन्य कोणा परमेश्वर नावाच्या ताकदीची आस त्यांना लागली नाही. ‘‘इतकी वर्षे पृथ्वीचा उगम आदीवर संशोधन केल्यावर माझी खात्री झाली आहे की, परमेश्वर अस्तित्वातच नाही. या विश्वाचा, आपला कोणी निर्माता नाही की भाग्यविधाता नाही. म्हणूनच स्वर्ग नाही आणि नरकही नाही. या विश्वाचे अस्तित्व समजून घेण्यासाठी हाती असलेला क्षण तेवढा आपला आहे आणि तो मिळाला यासाठी मी कृतज्ञ आहे,’’ असे हॉकिंग म्हणत. याच अर्थाने ते धर्म या संकल्पनेचे टीकाकार होते. ‘‘धर्म हा अधिकारकेंद्रित आहे, तर विज्ञानाच्या केंद्रस्थानी असतात ते निरीक्षण आणि तर्क. धर्म आणि विज्ञानाच्या या संघर्षांत अंतिम विजय हा विज्ञानाचा असेल, कारण ते जिवंत आणि प्रवाही आहे.’’ हे त्यांचे मत विचारी माणसाला मान्य होण्यासारखेच आहे.

©  श्री जगदीश काबरे

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ गेट टुगेदर…– लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? इंद्रधनुष्य ?

☆ गेट टुगेदर… – लेखक :  अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर

परवा, अचानक ओळखीचा आवाज आला खूप वर्षानंतर…

चेहऱ्यावर औदासीन्य पसरलेलं.. थरथर कापत काप-या आवाजात भयकंपीत झालेल्या एका मुलीने आवाज दिला, “ ए ओळखले का मला..? “ 

मी अंदाज घेऊन म्हणालो, “ अरे, तू तर ‘लोकशाही’ ना..! “

असे म्हणताच, तिच्या चेह-यावर मंद स्मित उगवले…. सूर्यासारखे….!

“ खूप वर्षे झाली ग, अंदाज चुकू शकतो… “

“ नाही रे, तू अगदी बरोबर ओळखले… “ ती म्हणाली…

मी.. “ पण तू तर जगातील सर्वात सुंदर व्यवस्था.. मग कोणी केली तुझी अशी ही अवस्था….

आणि कुठे गायब झाल्या तुझ्या मैत्रिणी.. मानवता, संवेदनशीलता अन् ती सहिष्णुता….? “

“ होय रे, ‘सहिष्णुता’ पुर्वी भेटायची, सर्वांची चौकशी करायची… पण हल्ली दिसत नाही रे.. सत्याची बाजू घेतली म्हणून तडीपार केले म्हणतात तिला.. ‘क्रांती’ सर वर्गशिक्षक होते…. तोपर्यंत सगळं ठिकठाक होते…

विद्रोह, प्रज्ञा व ‘संघर्ष’ हे सुद्धा होते.. बरं, ते जाऊ दे… “ – ‘लोकशाही’ म्हणाली.. “ माझी “मूल्ये” कशी आहेत रे….! . “न्याय, समता, स्वातंत्र्य, बंधुता”… “

“ अगं, ते तरी कशी असणार..! पुर्वी “न्याय” भेटायचा कधीकधी, तो परमनंट नाही झाला अजूनही..

कॉन्ट्रॅक्चूअल वर काम करतो… “

“ बरं ‘समता’ आणि ‘बंधुता’ च काय..? “

“ ‘समता’ तर इतिहासात फेल झाली होती… पण मुळात ती विषमतेच्या मगरमिठीत आहे.. “

“ आणि बंधुता कशी आहे..? “

“ अॕज इट इज…! अगं, ‘संविधान’ अन् तुझी अॕडमिशन एकाचवेळी झाली न.. कसा आहे ग तो…..? “

“ काय सांगू तो तर जगातील सर्वात प्रज्ञावंत विद्यार्थी.. संविधानामुळेच तुझी माझी ‘अस्मिता’ आहे..

खरं आहे रे ‘संविधान’ सोबत असलेले ‘समंजस’, प्रगल्भता आणि ‘व्यापकता’ यांनीच तर आपल्या वर्गाला एका सूत्रात बांधून ठेवले.. म्हणून तर ‘मानवता’ निर्माण झाली होती… आपल्या वर्गात… पण ‘फॕसिझम’ ची अॕडमिशन झाली आणि त्याने वर्गात विभाजनाचा प्रयत्न केला.. पण तो ‘षडयंत्र’ त्याच्या आवडीचा विषय 

तुला ‘विद्वेष’ आठवतो का..? जो नेहमी अबसेंट असायचा.. तोच आज मेरीट आहे.. आज त्यालाच लौकिक प्राप्त झाला आहे.. अरे आणि तेव्हा ‘संवेदनशीलता’, ही होती… प्रत्येकाच्या मनात जिवंत… ‘विद्वेष’ ने केला तिचा एनकाऊंटर.. तीच तर आहे खरी खंत… “अभिव्यक्ती” कशी आहे रे…. आपण जिला “मिडिया” म्हणायचो…? “

“ तिचीही अवस्था खराब आहे अगं, तिच्या गळ्यातील स्वरयंत्रावर स्वार्थाची सूज आल्याने ती ‘सत्या’ ची बाजू न मांडता, ‘सत्ते’ चे गाणे गात असते.. ती आता तटस्थ नाही राहिली.. “

“ अरे आणि तुला आठवते का… आपल्या वर्गात एक होती ‘निष्ठा’, “

“ हो ग… तिच्यावरच तर अवलंबून होती सर्वांची ‘प्रतिष्ठा’…. पण सध्या… ‘निष्ठा’ सुध्दा “अर्थ ” शास्त्राला सरेंडर झाली.. आणि ‘एथिक्स’ मध्ये फेल झाली.. असे ऐकले.. “ मी म्हणालो.

“ आणि हा ‘फॅसिझम’ कोण ग…? “

लोकशाही म्हणाली, “ तो बघ ‘प्रतिक्रांती’ च्या टीममध्ये होता.. नेहमी अवैज्ञानिक, तर्कविसंगत.. गोष्टी करायचा.. दंतकथांना इतिहास मानायचा.. अन् खरं म्हणजे ‘अंधश्रद्धा’ ही त्याची पक्की मैत्रीण होती.. “

“ हो ग..! , ती काही बदलली का येवढ्या वर्षात..? “

“ नाही रे.. अजून तरी नाही.. मला वाटते, ती बदलली असती पण तिने ‘विवेका’ शी असलेली मैत्री तोडली

त्यामुळे ती नेहमी अविवेकी, अतार्किक वागते… बरं… , ‘मनु’ कसा आहे..? “

“ होता तसाच आहे… अग, तुला आठवते का..? आपल्या वर्गात ‘आपुलकी’ ‘नितिमत्ता’ होती…

 फार प्रेमळ तिची “भावना” होती. परस्परांच्या भावनांची कदर करायची.. त्यामुळे “प्रज्ञा” सुध्दा त्यांचा आदर करायची.. संघर्ष’ आणि ‘विद्रोह’ ते सातत्याने अन्यायाविरुद्ध पेटून उठायचे… ते दोघेही नेहमी ‘क्रांती’ च्या सोबत असायचे… पण आजकाल सगळे कव्हरेज क्षेत्राबाहेर आहेत.. फोन लागत नाही त्यांना.. ”

“ “करुणा” लाही फोन करून बघशील बरं… ‘विद्या, शिल’ आणि ‘मैत्री’ सुध्दा भेटले तर सांग त्यांना. ” 

“ अगं, मला ‘विकास’ भेटला होता… मी कुतूहलाने त्याला म्हणालो.. ”अरे, किती बदलला तू… अग, तो ‘वाढ’ लाच विकास समजत होता… तो अंगात खूप फुगला…. पण ती फक्त ‘वाढ’ होती… विकास “अंतर्बाह्य” असतो… तो गुणात्मक असतो ना.. “

“अरे, समजेल त्याला कधी ना कधी… “

“ पण तोपर्यंत…. काय….? ”

“ बरं, आणि ‘अहंकार’ कसा आहे. रे…? ‘अहंकार’ आणि ‘स्वाभिमान’ दोघेही दिसायला सारखेच दिसत होते रे.. माझे नेहमी कन्फ्युजन व्हायचे.. “

“ नाही ग… त्याच्या सोबत नेहमी ‘नम्रता’ असायची व “स्वाभिमान” सोबत ती एकाच बेंचवर बसायची….

तो ‘स्वाभिमान’…! ‘स्वाभिमान’ ला ही बोलावू म्हणतो… “

“ अर्थातच, तो तर कणा आहे.. आपल्या टिमचा… त्याच्या शिवाय ‘चळवळ’ येणार नाही… “

“ बरं ‘चळवळ’ कशी आहे रे…? “ 

“ कोणती चळवळ..? शोषकांची…! की, शोषणमुक्तीची…! की मानवमुक्तीची..! तुला खरं सांगु का.. जेव्हा आपल्या गृपमधून ‘निष्ठा’ गेली.. अन् “तृष्णे”‘ ची अॕडमिशन झाली… तेव्हा पासून ‘चळवळ’ कणाहीन झाली… तिची परवड सुरू झाली… बघ ना ‘त्याग’ व ‘समर्पण’ ची जोपर्यंत ‘निष्ठे’ सोबत मैत्री होती 

तोपर्यंत ‘चळवळ’ गतिमान होती.. खरं तर तीच तर आपल्या अभिमानाची खाण होती.. “

“ हं.. आणि “करुणा” बद्दल काय…? ”

“ करुणा म्हणाली, ‘समता’ आली तरच मी येईल.. तिच्याशिवाय..

निर्हेतूक मैत्री होती…. तेव्हाच तर खरी खात्री होती…. “

“ अरे आपल्या वर्गात ‘विश्वास’ होता… “

“ होय.. तोच तर जगण्याचा खरा ‘श्वास’ होता.. “

“ आणि काय रे.. अरे, ती प्रतिक्रांती काही बदलली का..? बरं, तिची मूल्ये विषमता, भीती, अविद्या

बरी आहेत ना..! “

मी म्हणालो, “ लोकशाही, तु सगळ्यांची चिंता करतेस.. “

“ नाही रे…. आपली ‘संस्कृती’ मानवतावादी आहे ना… विचारांचा फरक जरी असला, मतभेद असले तरी आपले त्यांच्यावर प्रेम आहेच.. शेवटी ते सर्व आपले वर्ग मित्र आहेत.. “

लोकशाही म्हणाली, “ होईल रे… सगळं बदलेल.! . तुला आठवतो का…. आपल्या वर्गातला ‘परिवर्तन’ 

तो पूर्वी ‘प्रस्थापित’ सरांची बाजू मांडायचा.. माझ्याशी जोरजोरात भांडायचा.. एक दिवस तो स्वतः ‘विस्थापित’ झाला… अन् त्याच्या विचारात, आचारात.. अचानक.. बदल झाला. आज तो प्रतिगामीत्व नाकारतो, विस्थापितांच्या समस्यांवर बोलतो.. लिहितो.. प्रहार करतो.. आता तर त्याने ‘पुरोगामी’ विषयात ‘पीएचडी’ केली.. अन्यायाविरुद्ध पेनाला धारधार करतो. “

“परिवर्तन होत असते रे… फक्त आपल्या सोबत ‘प्रबोधन’ असला पाहिजे… तोच एकमेव मार्ग मला दिसतो…. हे सगळे आपले वर्गमित्र भेटले तर सांग त्यांना “

मी म्हणालो, “ काय सांगू.. “

‘लोकशाही’ म्हणाली, “ गेट टुगेदर करू म्हणते.. “

“ कुठे..? “

“सेक्युलर” ग्राऊंडवर… “

“पण नियोजन कोण करणार.. ”

“भारतीय नागरिक सर…! “

“ अग,… पण गेट टुगेदर कशासाठी…? “

“ सर्वांच्या मनाची पुनर्रचना करून हे जग पुन्हा सुंदर करण्यासाठी रे..! ! “

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : अमोल केळकर 

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “पूनम गुप्ता” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

पूनम गुप्ता ☆ श्री संभाजी बबन गायके 

पूनम गुप्ता 

कार्य सिद्धीस नेण्यास श्री समर्थ आहेत!

वर्ष होतं २०२३. दिवस होता भारताचा ७४वा प्रजासत्ताक दिन… २६ जानेवारी! राजधानी दिल्लीतल्या कर्तव्यपथावर सेन्ट्रल रिझर्व पोलिस फोर्समधील महिलांची एक सुसज्ज तुकडी मोठ्या डौलात, दिमाखात आणि आत्मविश्वासाने मार्च करीत पुढे निघाली होती. ही जगातील पहिली सशस्त्र महिला पोलिस बटालियन…. CRPF…All Women Armed Police Battalion!

भारताच्या राष्ट्रपती महोदया आणि तीनही सेनादलांच्या सेनापती महामहिम श्रीमती द्रौपदी मुर्मू सलामी स्वीकारण्यासाठी उभ्या होत्या. पाहता पाहता ही तुकडी सलामी मंचासमोर आली. या तुकडीचे नेतृत्व करणा-या तरुण, रुबाबदार महिला प्रमुखाने उजव्या हातात समोर धरलेल्या तलवारीची मूठ आपल्या मुखासमोर नेली आणि आपल्या तुकडीला अत्यंत आवेशाने आदेश दिला…. दहिने देख! दुस-याच क्षणी आणि तिने आपल्या हातातल्या तलवारीचे टोक सेनापती महोदयांच्या सन्मानार्थ जमिनीच्या दिशेला केले. आपल्या सेनापतींना मानाची सलामी देत ही तुकडी पुढे मार्गस्थ झाली! या तुकडीचे नेतृत्व करीत होत्या असिस्टंट कोमांडंट पूनम गुप्ता. या तरुण, तडफदार अधिकारी मूळच्या ग्वाल्हेर (Gwalior) येथील शिवराम कॉलनी, शिवपुरी इतल्या निवासी आहेत. त्यांचे पिताश्री रघुवीर गुप्ता हे तिथल्या नवोदय विद्यालयात Office Superintendent पदावर कार्यरत आहेत. अभ्यासात अत्यंत हुशार असलेल्या पूनम गुप्ता गणित विषयात पदवीधर असून सोबतीला इंग्रजी साहित्यातही त्यांनी पदव्यूत्तर पदवी प्राप्त केलेली आहे. शिवाय बी. एड. पदवी प्राप्त करून त्या शिक्षिका होण्याच्या बेतात होत्या. परंतु त्याच्या नशिबाने अचानक मार्ग बदलला… त्या २०१८ च्या UPSC CAPF परीक्षेस त्या प्रविष्ट झाल्या आणि त्यांनी ८१वा क्रमांक पटकावला… त्या आता Assistant Commandant झाल्या होत्या! त्यांना बिहार मधील नक्षल-प्रभावित भागात कर्तव्यावर पाठवण्यात आले. तेथे त्यांनी उत्तम कामगिरी बजावली. २०२३ च्या प्रजासत्ताक दिनाच्या सैनिकी संचालनात त्यावर्षी सर्व महिला सदस्य असलेली तुकडी समाविष्ट करण्यात आली होती. आणि या तुकडीचे नेतृत्व करण्याचा बहुमान पूनम गुप्ता यांना प्राप्त झाला!

योगायोगाने काहीच दिवसांत पूनम गुप्ता यांना राष्ट्रपती भवनात नेमणूक मिळाली ती राष्ट्रपती महोदयांची Personal Security Officer या मोठ्या जबाबदारीच्या पदावर. आपल्या अत्यंत कर्तव्यदक्ष परंतु मितभाषी स्वभावाने, सुसंस्कृत वागणुकीने आणि उच्च दर्जाच्या प्रशिक्षणातून प्राप्त केलेल्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचे संरक्षण करू शकण्याच्या क्षमतेमुळे पूनम यांनी सर्वांची मने जिंकून घेतली… विशेषता: महामहिम राष्ट्रपती महोदयांच्या नजरेत त्या भरल्या! आपले कर्तव्य सांभाळून पूनमजी महिला सबलीकरण करण्याच्या कामांत आपला वाटा उचलीत आहेत. महिला, विद्यार्थी यांच्यासाठी त्या प्रेरक संदेश त्यांच्या सोशल मिडीया वरून नियमित देत असतात. त्या अनेक मुलींच्या प्रेरणास्रोत बनल्या आहेत.

आनंदाची बाब म्हणजे काही दिवसांपूर्वीच पूनम गुप्ता यांचा विवाह जुळला… त्यांचे नियोजित पती श्री. अवनीश कुमार हे सुद्धा सैनिक अधिकारी असून सध्या जम्मू-कश्मीरमध्ये CRPF Assistant Commandant पदावर नियुक्त आहेत. येत्या १२ फेब्रुवारीला हे लग्नबंधनात बांधले जाणार आहेत… पण खरी गोष्ट तर पुढेच आहे!

हा विवाह सोहळा चक्क राष्ट्रपती भवनात साजरा होणार आहे. आणि प्रमुख आयोजक आहेत महामहिम राष्ट्रपती महोदया श्रीमती द्रौपदी मुर्मू! आजवरच्या इतिहासात राष्ट्रपती भवनात साजरा होणारा हा पहिलाच विवाह सोहळा ठरणार आहे! पूनम गुप्ता या खरोखरीच नशीबवान ठरल्या आहेत. आणि हा अलौकिक निर्णय घेणा-या महामहिम राष्ट्रपती महोदयांचे कौतुक करावे तेवढे अपुरेच ठरेल… जणू त्यांनी एका महिला सैनिक तरूणीला आपली कन्या मानले आहे… आणि त्यांच्याच प्रासादात त्या हा मंगल सोहळा घडवून आणणार आहेत. आपण केवळ राष्ट्रप्रमुखच नसून भारत देश नावाच्या एका विशाल कुटुंबाच्या प्रमुखच आहोत हेही त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे! जयहिंद, Madam President! अभिनंदन पूनम गुप्ताजी.. अभिनंदन अवनीशजी! नांदा सौख्यभरे!

  

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘महाकुंभ धार्मिक ते इव्हेंटचा ताळमेळ…’ – लेखिका : सुश्री स्वाती महाजन जोशी ☆ प्रस्तुती : डॉ. ज्योती गोडबोले  ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘महाकुंभ धार्मिक ते इव्हेंटचा ताळमेळ…‘ – लेखिका : सुश्री स्वाती महाजन जोशी ☆ प्रस्तुती : डॉ. ज्योती गोडबोले 

महाकुंभची चर्चा गेली तीन चार महिने सुरू होती. मुळात जास्त गर्दीत जाण्याची अजिबात आवड नसलेली मी प्रयागराजला जाण्याचा विचारही केला नव्हता. लांबून बघू. वेगवेगळ्या वाहिन्यावरून आनंद लुटण्याचे ठरविले होते. फार धार्मिक नसल्याने तेही पुरेसे होते. पण पण पण खर सांगायचे तर माझ्यातला पूर्वीचा पत्रकार जागा झाला. एवढे लोक का जातात, आणि नक्की काय वातावरण असते हे बघण्याची उत्सुकता निर्माण झाली. आणि एका ग्रुपवर कल्पनाने विचारले महाकुंभला जायला कोणी तयार आहे का? लगेच होकार कळवला. बघता बघता दहाजणी तयार झाल्या. पण काही कारणाने फक्त चारजणी निघालो. आम्ही जात असलेल्या तारखा या आमच्या पथ्यावर होत्या.

आम्ही ज्या दिवशी पोहोचणार होतो, त्याच दिवशी महाकुंभत पंतप्रधान मोदी येणार होते. काय परिस्थिती असेल याची काहीच कल्पना नव्हती. आम्ही सेक्टर १० मध्ये संस्कार भारतीच्या तंबूत होतो. तिथे अजिबात गर्दी नव्हती. त्या भागातील गंगा मैय्याचा किनारा मोकळा होता. आम्ही मनसोक्त गंगामैय्येत डुंबलो. अरे काहीच गर्दी नाही, उगाचच लोक घाबरवत होते, असे वाटून गेले. दुपारी बाहेर पडलो. नदीच्या दोन किनाऱ्यावर महाकुंभचे शहर पसरलेले आहे.

आमच्या भागात विविध संस्थांचे मंडप होते. नेत्र कुंभ, अमृतानंदमयी, रावेतसरकार असे विविध प्रवचनकार, सेवाभावी संस्था तसेच विविध राज्यांचे मंडप होते. मुख्यतः सांस्कृतिक आणि इव्हेंट असे या भागात होते. तर सर्व आखाडे दुसऱ्या किनाऱ्यावर होते. हे सर्व बघत प्रयाग शहरात आलो, तेव्हा गर्दीचा अंदाज आला. तरीही वाहनांना प्रवेश देण्याइतके रस्ते रिकामे होते. आम्ही चौघीही खूष होतो. आपले त्रिवेणी संगमावरचे स्नान सहज होईल. पण गंगा मैय्याच्या मनात जे असते तेच होते, अशी श्रद्धा प्रयागच्या नागरिकांमध्ये असते. त्याचे प्रत्यंतर आम्हाला आले. ६ फेब्रुवारीला प्रयागमध्ये लोकांचा समुद्र बघायला मिळाला. पण स्नान करायचेच या जिद्दीने आम्ही चालत राहिलो. किती चाललो माहित नाही. असेल १२-१४ किलोमीटर. मग खूप प्रतीक्षेनंतर स्नान झाले. संगमात उतरल्यावर मन शांतावले. सर्व क्षीण नाहीसा झाला. मन काही क्षणापुरते निर्विकार झाले. मग परतीचा प्रवास तेवढ्याच चालण्याने झाला. महाकुंभात सर्वजण समतल पातळीवर आल्याची जाणीव सुखावून जात होती. गाडीघोडा, पैसा काही उपयोगाचा नाही हे येथील गर्दी सांगून जात होती.

सुव्यवस्थेचा -स्वच्छतेचा कुंभ

या सर्व प्रवासात आम्हाला जाणवले ते खरंच शब्दांत मांडणे अवघड आहे. दिड महिन्याच्या काळात ४५ कोटी लोक येणार त्यांना सर्व प्रकारच्या सुविधा पुरवणे म्हणजे शिवधनुष्य पेलण्याइतके अवघड होते. पण प्रयागराजला गेल्यावर तिथल्या यंत्रणेने हे शिवधनुष्य लीलया पेलले आहे हे लक्षात आले. गंगा मैय्याच्या पूरक्षेत्रात पूर्ण शहर सर्व सुविधांसह उभारण्यात आले आहे. गंगा मैय्या सप्टेंबर पर्यंत तिथे मुक्काम ठोकून होती. ती आपल्या जागेवर परतल्यावर कामे सुरू झाली, असे स्थानिक सांगत होते. म्हणजे फक्त साडेतीन महिन्यांत अगदी वीजपुरवठ्यासाठीची यंत्रणा, मलनिःसारणाची सोय, पाणीपुरवठ्याच्या वाहिन्या सर्व उभारण्यात आल्या. प्रत्येक संस्थेला जागा ठरवून देण्यात आल्या. त्यावर मंडप, तंबू टाकण्याची आणि शौचालये उभारण्याची जबाबदारी संस्थांवर होती. पूरक्षेत्र असल्यामुळे सगळीकडे वाळूच वाळू. त्यावर सर्व रचना उभारली आहे. शौचालयाची प्लास्टिकची भांडी त्यात रोवण्यात आली आहेत. सर्व मैला एकत्र करण्यासाठी मोठ्या टाक्या जमिनीच्या खाली बसवल्या आहेत. दर दोन दिवसांनी त्या साफ करायला राज्य सरकारची मलनिःसारणाची गाडी येते. रस्त्यावर जागोजाग तात्पुरती शौचालये आहेत. पण ना त्यातून घाण बाहेर येते ना पाणी ना दुर्गंधी. साफ करणाऱ्यासाठी नेमलेले सेवक तत्परतेने काम करत होते. रस्त्यावर अगदी क्वचित कचरा दिसत होता.

श्रद्धेचा-मानवतेचा कुंभ

महाकुंभात येणाऱ्या भाविकांना खूप संस्था सेवा देत आहेत. प्रसाद म्हणून चहा, पाण्याच्या बाटल्या, नाश्ता वाटप सुरू आहे. इस्कॅानने तर लाखो लोकांना जेवण देण्याची सोय केली होती. महाप्रसादाच्या लाईनीमध्ये खूप तरूण मुलं-मुली उभी दिसली. ही मुले कोण हा प्रश्न मनात येतच होता तेवढ्यात रिक्षाचालकाने सांगितले की हे सर्व प्रयागमध्ये बाहेरून शिकायला आलेले विद्यार्थी आहेत. बहुतेकांचे पालक शेतकरी किंवा शेतमजूर आहेत. गेल्या महिन्यापासून त्यांचा दोन वेळच्या जेवणाचे पैसे वाचले आहेत. अगदी सहजतेने मिळालेल्या माहितीने मनात येऊन गेले अरे हा श्रद्धेबरोबरच मानवतेचा कुंभ आहे. सर्वांच्या हातात स्टीलच्या एकसारख्या थाळ्या होत्या. जेवण झाले की प्रत्येक जण त्या धुवून पुढच्या भाविकाच्या हातात देतात, हेही रिक्षाचालकाने सांगितले.

गंगा मैय्याचे प्रेम

महाकुंभ नसताना किती श्रद्धाळू येतात, असे रिक्षाचालकाला विचारले. गंगा मैय्येच्या कृपेने पोटापुरता धंदा होतो. पावसाळ्यात मात्र गंगा मैय्या उग्र रूप धारण करते. ती माझ्या घराच्या पायरीपर्यत येते. कधी तीन कधी चार-पाच दिवस राहते आणि मग निघून जाते, हे रिक्षाचालक सांगत असतानाच मला कुसुमाग्रजांच्या मोडला नाही कणा या कवितेची आठवण झाली. गंगा मैय्येवर येथील लोकांच्या अपार श्रद्धा आहे.

.. तशीच भक्ती लड्डू गोपालवर आहे. आपण रोज जे जे करतो तसाच दिनक्रम ते लड्डू गोपालचा पाळतात. कुठेही जाताना गोपाल बरोबर असतोच. त्याला एकट्या घरी कसे ठेवायचे ही त्यामागची भावना. कुंभातही अनेकांच्या लड्डू गोपालची बास्केट होती. माझ्या परीघातील कोणीच एवढे श्रद्धावान नाही, त्यामुळे मी हे पाहून अचंबित झाले.

एकदंर हा महाकुंभ जितका साधू-संतांचा-भाविकांचा आहे. तितकाच तो स्वच्छता कर्मचारी आणि पोलिस यंत्रणेचाही आहे. माणसाच्या समुद्राला नम्रतेने शिस्तीत बांधण्याचा प्रयत्न करणाऱ्या या यंत्रणेला खरंच सलाम करावासा वाटला. माताजी- बहेनजी- भैय्याजी- स्वामीजी म्हणत वर्दळ सुरळीत ठेवण्याचा त्यांचा आटोकाट प्रयत्न खरंच सुखावून जात होता.

आम्ही चारचौघीच होतो. फक्त महिला म्हणून कुठेच कसलाच त्रास झाला नाही. अगदी लखनौवरून रात्री २ वा. प्रवास सुरू करायलाही आम्हाला भीती वाटली नाही. हा महाकुंभचा परिणाम की तेथील राज्य सरकारबाबत असलेला विश्वास सांगता येत नाही पण चार दिवसात कधीच कसलीच भीती वाटली नाही हे मात्र खरं.

– – – अतिगर्दीचे, वाहतूक कोंडींचे व्हिडिओ येत आहेत, ते खोटे आहेत असे म्हणणे चुकीचे ठरेल. पण यंत्रणेच्या मर्यादा लक्षात घेतल्या तर परिस्थिती पुढे तेही शरणागत आहे. महाकुंभाचा धडा म्हणजे गंगा मैय्येच्या मनात असेल तर स्नान घडले. तिला शरण जा ती तुम्हाला आशिर्वाद देईलच.

लेखिका : सुश्री स्वाती महाजन जोशी 

प्रस्तुती : डॉ. ज्योती गोडबोले 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ तुकोबारायांची होळी… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

 

? इंद्रधनुष्य ?

☆ तुकोबारायांची होळी…  प्रस्तुती – सुश्री नीलांबरी शिर्के 

‘मी होळीत काय आणि का जाळलं? ‘ याविषयी तुकोबाराय सांगतात,

 दैन्य दुःख आम्हां न येती जवळीं । दहन हे होळी होती दोष ॥ 

लोकं होळीत शेणाच्या गवऱ्या, लाकडं जळतात. पण तुकोबा म्हणतात..

” मी होळीत माझ्यातले ‘दोष’ जाळले. आणि दोष जाळण्याचा परिणाम असा झाला, की दारिद्र्य आणि दुःख माझ्या जवळसुद्धा येत नाही. ” 

दोष नाही, तर दारिद्र्य नाही. त्यामुळं दारिद्र्यातून निर्माण होणारं दुःख नाही…

सर्व सुखें येतीं मानें लोटांगणी । कोण यासी आणी दृष्टिपुढें ॥ 

.. “दु:ख तर जवळ येतंच नाही, उलट सुखं माझ्यापुढं लोटांगण घालतात आणि आम्हाला येऊ द्या म्हणतात. पण मी त्यांना माझ्या डोळ्यासमोरही उभं करत नाही. ” 

…. सगळं जग सुखाच्या मागं लागलेलं असताना, तुकोबाराय सुखाला हाकलून लावतात. कारण, त्यांना सुखाची हाव नाही, आणि दोष जाळल्यामुळं दुःख तर आधीच दूर पळून गेलेलं आहे…

आमुची आवडी संतसमागम | आणीक तें नाम विठोबाचें ॥ 

.. मला सुखाची अपेक्षा का नाही? तर, “संतांचा सहवास आणि विठोबाचं नाव, एवढ्याचीच मला आवड आहे. ”

आमचें मागणें मागों त्याची सेवा | मोक्षाची निर्देवा कुणा चाड? ॥ 

“मला मागायचंचअसेल, तर मी सुख नाही मागणार. फक्त ‘संतांचा सहवास आणि विठोबाचं नाव’ एवढंच मागेन. याच्यापुढं तर मला मोक्षसुद्धा नको. या सुखापुढं मोक्षाची आवड कुण्या दुर्दैवी माणसाला राहील? ”

तुका म्हणे पोटीं सांठविला देव | न्यून तो भाव कोण आम्हां? ॥ 

“मी माझ्या पोटातच विठ्ठलाला साठवून ठेवलं आहे. वैकुंठ देणारा विठ्ठलच माझ्यात साठवून घेतल्यामुळं, मला आता कशाची कमतरता? ” 

…. सगळं भरून पावल्यासारखंच आहे. म्हणून मला मोक्ष नको. अर्थात मोक्षानंतर मिळणारं वैकुंठही नको.

धन्य ते तुकाराम महाराज आणि धन्य ती संतांची मांदियाळी

आपल्यातीलही सर्व दोष जळावेत म्हणून मनापासून शुभेच्छा 

प्रस्तुती –  सुश्री नीलांबरी शिर्के

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “‘दैवतीकरण’ साहजिकच!” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

 

? इंद्रधनुष्य ?

“‘दैवतीकरण’ साहजिकच! ☆ श्री संभाजी बबन गायके 

११ मार्च २०२५… ३३६ वर्षे उलटून गेली छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या बलिदानाला. ११ मार्च १६८९ ते ११ मार्च २०२५ … या काळात स्वधर्मासाठी एवढा प्रचंड त्याग आणि वेदनांशी लढा इतर कोणाच्याही इतिहासात आढळून येत नाही!

शारीरिक छळाची वर्णने शब्दांत वाचून सहृदय माणसाच्या मनावर जेवढा परिणाम होतो, त्यापेक्षा ती अभिनित दृश्ये पाहताना होतो तो परिणाम अपरिमेय असतो. छावा चित्रपटातील शेवटची दृश्ये पडद्यावर पाहून जवळपास सर्वच प्रेक्षक नि:शब्द होतात, हे त्याचेच द्योतक म्हणावे लागेल.

क्रूरकर्मा औरंगजेब खरे तर छत्रपती संभाजी महाराजांचे प्राण एका वारामध्ये घेऊ शकला असता. पण त्याने त्यांच्या मृत्यूचा उपयोग उभ्या महाराष्ट्रालाच नव्हे तर त्याच्या वाटेत येऊ पाहणा-या प्रत्येकाच्या मनात कायमची धडकी भरवण्यासाठी केला… हे सर्वश्रुत आहे! पण त्याचे हे मनसुबे पूर्ण झाले नाहीत… हा इतिहास आहे! अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जीभा… हा या मराठी मातीचा बाणा आहे!

आपल्यापेक्षा सामर्थ्यवान असलेल्या व्यक्तींना सन्मान देण्याची मानवी सहजवृत्ती आहे. किंबहुना अवघ्या प्राणिसृष्टीमध्ये ही वृत्ती आढळून येते. मानवाने त्याच्यापेक्षा सामर्थ्यवानांस देव ही पदवी देण्याची रीत दिसून येते. राजाला भूदेव अर्थात पृथ्वीवरचा देवाचा अवतार किंवा देवच मानले जाते, हे आपण पाहू शकतो.

अखंड स्मरणीय थोरले छत्रपती श्री शिवाजी महाराज साहेब आणि धाकलं धनी अखंड स्मरणीय श्री संभाजी महाराज साहेब यांना रयतेने आपल्या मनातल्या गाभा-यात देवाचे स्थान दिले आहे, हे कोण नाकारू शकतो?

महापुरुषांना देवत्व देऊन त्यांना गाभा-यात बसवणे, त्यांची पूजा करणे, आरती करणे याला विचारवंत माणसांचा आक्षेप आहे. या महापुरुषांच्या विचारांचा, मार्गदर्शनाचा विसर पाडून घेऊन त्याच्या विरुद्ध कृती करणे इथपर्यंत हा आक्षेप योग्यच आहे. पण, या ‘देवांच्या’ विचारांवर चालणारी माणसं जर यांना देवत्व बहाल करत असतील, तर त्यांच्या भावना दुखावण्याचा अधिकार कुणाला कसा प्राप्त होतो, हा प्रश्न आहे.

प्रभू श्रीराम, प्रभू श्रीकृष्ण यांचे देवत्व मान्य करून त्यांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन जीवन व्यतीत करणारे अनेक लोक आहेत. त्यामुळे समाजाचे कल्याणच झाले आहे. अर्थात, देवत्वाचे स्तोम माजवून त्या माध्यमातून आर्थिक, सामाजिक प्राप्ती करून घेऊन आपले ऐहिक जीवन सुखमय करणारे लोकसुद्धा आहेत, हे आपले दुर्दैव म्हणावे लागेल… पण त्याला काही इलाज नाही. आपण केवळ आक्षेप नोंदवू शकतो… तोही तशी सोय असेल तर!

आधी सामान्य माणसे म्हणून दृष्टीस पडलेले महात्मे पुढे मठात, मंदिरांतल्या गाभा-यांत विराजमान झालेच की. त्यांच्या आरत्या, स्तोत्रे, ग्रंथ निर्माण झालेच की. त्यांच्यामागे खूप मोठा समुदाय असून ते अनेक लोकोपयोगी कामे सिद्ध करतात, हे ही खरेच आहे. आणि याला आक्षेप असण्याचे कारण नाही.

गेली कित्येक वर्षे श्री संभाजी महाराज बलिदान मास पाळणारी, उपवास करणारी, विशिष्ट अन्न त्यागणारी, पादत्राणे न घालणारी हजारो माणसे आहेत. काही ठिकाणी मंदिरे सुद्धा निर्माण झाली आहेत. ‘जय देव जय देव जय श्री शिवराया’ ही स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांनी लिहिलेली आरती आहेच. यातून सामान्य लोकांच्या मनात धर्मप्रेम, राष्ट्रप्रेम जागृत होत असेल तर याचे स्वागतच करायला पाहिजे. मराठी सैनिक जेंव्हा युद्धात ‘ बोल श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय…’ अशी गर्जना करत देशाच्या रक्षणासाठी प्राणार्पण करतात त्यामागे ही देवत्वाचीच भूमिका असते.

केवळ देव मानून थांबू नका…. त्यांच्या देवत्वाचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करा… हे सांगणे वेगळे आणि देवत्व देऊ नका! हे सांगणे वेगळे.

शेवटी, समाजात सामान्य लोक बहुसंख्येने आहेत हे मान्य करून त्यांच्या भावनांना यथायोग्य मान देत देत काही सुधारणा सुचवता आल्या तर जरूर तसे करावे.. पण सरसकट ‘नको’ हा विचार टिकणारा नसल्याने त्याज्य आहे!

मी चार वर्षांपूर्वी छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारीत एक आरती लिहिण्याचा असफल प्रयत्न केला होता. जमेल तसा युट्यूब विडीओ तयार करून प्रसिद्ध केला होता. यात श्री आशुतोष मुंगळे या गायकाने आवाज दिला आहे. ते शब्द संदर्भासाठी इथे देत आहे. यातूनही कुणी योग्य ती प्रेरणा घेऊ शकते!

☆ श्री छत्रपती संभाजी महाराज यांना शब्दवंदना ….आरती! ☆

काव्य लेखन :- श्री संभाजी बबन गायके.

गायन:-आशुतोष मुंगळे

आरती ओवाळू शिवसूत श्री शंभू राया

मुजरा स्वीकारावा तुमच्या वंदितो पाया…

शालिवाहन शक पंधराशे एकोणऐंशी वर्ष

मराठी मातीला बहु जाहला हर्ष…

द्वादशी शुद्ध मास शोभला ज्येष्ठ

देहासी आले श्री शंभू नरश्रेष्ठ …

पुरंदराच्या हृदयी मावेना माया…

 *

शिवरायांच्या सईबाईंची उजवली कूस

घडवण्या समशेर सज्ज सह्याद्री मूस…

युवराजांच्या कंठी शोभे कवड्यांची माळ 

शिवगंधाने सजले भव्य रुंद ते भाळ…

जिजाऊ आतुरल्या शंभू बाळा पहावया…

 *

उधळला चौखूर शंभू रायांचा अश्व

रोमांचित झाले अवघे मराठी विश्व…

लढता शंभू भासे जैसा कोपला रुद्र

भेदी चक्रव्युहा अभिमन्यू सौभद्र…

भगवा विजयी गगनी पहा लागे फडकाया…

 *

आत्मसात करुनी शास्त्र भाषांचे ज्ञान

सभेत पंडितांच्या शंभू शोभे विद्वान…

रयतेचा राजा घेई न्यायाचा पक्ष

शिवरायांचा छावा शंभू प्रजाहित दक्ष…

सिंहाची गर्जना शत्रू लागे कांपाया…

 *

अवचित काळोखाने सूर्य झाकोनिया गेला…

उजेड अंधाराने खोल पाताळी नेला…

झुकली ना दृष्टी विझल्या नयनांच्या ज्योती

हर हर महादेव थेंब रक्ताचे गाती…

मृत्यू गहिवरला येता शंभुशी न्याया…

 *

आरती ओवाळू शिवसूत श्री शंभू राया…

मुजरा स्वीकारावा तुमच्या वंदितो पाया!…

  

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “राम रसाचिया चवी। आत रस रुचती केवी॥” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

 

? इंद्रधनुष्य ?

राम रसाचिया चवी। आत रस रुचती केवी॥ ☆ श्री संभाजी बबन गायके 

जीवनात राम असेतो जीवनात राम असतो, असे संत सांगून गेलेत. एकदा का राम असे नाम असलेला रस रसनेने चाखला की अखिल विश्वातला कोणताही रस रसनेला नको असतो असे जगदगुरू श्री संत तुकोबाराय सांगून गेले! 

परमार्थात सगुण भक्ती अतिसुंदर मानली जाते. पाषाणाची मूर्ती भक्तांच्या भावनेमुळे आणि प्रेमाच्या वर्षावाने सजीव साकार होते. आणि या संजीवन अस्तित्वाची अहर्निश सेवा ज्यांना लाभते ते अखंडित भाग्याचे स्वामी म्हणवले जातात. 

शरयू तीरावरची अयोध्या नगरी प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने तीर्थ झाली. रामायण घडले…प्रभूंनी शरयूत देहत्याग केला! 

रामराज्यानंतर भरतभूमी अनेक आक्रमणांची साक्षीदार बनली…आणि भक्ष्यसुद्धा!  

उत्तर प्रदेशातील संत कबीरनगर मधील जिल्ह्यातील एका गावात जन्मलेले एक युवक २० मे १९५५ रोजी दहा वर्षांचे झाले आणि त्यांनी अयोध्येत पाऊल ठेवले आणि त्यांना अयोध्येने आकर्षून घेतले. त्याआधी बाल्यावस्थेत हे युवक कित्येकदा अयोध्येत येत असत आणि त्यांना हे स्थान परिचयाचे वाटत असे! अगणित वर्षांपूर्वी याच अयोध्येत महाराज दशरथ यांच्या राजप्रासादात पौरोहित्याची धुरा वाहिलेले ऋषीच पुन्हा अयोध्येत आले असावेत बहुदा. हे युवक हनुमान गढी मंदिराच्या सिद्ध पीठाचे महंत आणि आपल्या वडिलांचे गुरु बाबा अभिराम दास यांचे शिष्य बनले. आणि या कोवळ्या वयात त्यांनी सांसारिक सुखांचा त्याग केला आणि त्यांचे मन राम रंगी रंगले. वयाच्या विसाव्या वर्षी हे युवक सत्येंद्र हे नाम धारण करून पुजारी बनले होते. संस्कृत व्याकरण विषयात पारंगत होऊन ते आचार्यपदी विराजमान झाले होते. पुढे त्यांना सत्य धाम गोपाल मंदिराची जबाबदारी सोपवली गेली.  

१९७५ मध्ये त्यांना रामकोट येथील त्रिदंडदेव संस्कृत पाठशाळेत संस्कृत शिक्षक म्हणून नेमणूक मिळाली. रामजन्मभूमी मुक्ती विषय ऐन भरात असताना सत्येंद्र दास यांनी प्रभू रामचंद्र यांची पूजा सेवा करण्यास आरंभ केला होता.

१९९२च्या आधी काही महिने सत्येंद्रनाथ यांना अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी स्थानातील श्रीराम यांचे अधिकृत पुजारी म्हणून सेवा प्राप्त झाली. संबंधित अधिकारी वर्गाने त्यांना मानधन घ्यावे लागेल असे सांगितले. महंत सत्येंद्र यांनी प्रभूंचा प्रसाद म्हणून केवळ रुपये शंभर द्यावेत,अशी विनंती केली. २५ मार्च २०२० रोजी प्रभू त्यांच्या मूळ स्थानापासून तात्पुरते दूर गेले…सत्येंद्रदास त्यांच्या सोबत गेले…आणि प्रभूंना घेऊन २२ जानेवारी २०२४ रोजी पुन्हा मूळस्थानी आले….जेथे जातो तेथे तू माझा सांगाती हे तू जेथे जातो तेथी मी तुझा सांगाती असे झाले होते…सत्येंद्र यांनी आपल्या ‘दास’पणात खंड पडू दिला नाही…..हा कालावधी जगाच्या भाषेत ३२ वर्षे,११ महिने आणि १ दिवसाचा भरला! आणि एकूण ७९ वर्षे ८ महिने आणि २३ दिवसांच्या जीवनाकालातील उणीपुरी ६० वर्षे ईश्वरसेवेत रमलेल्या या देहात रामचिन्हे प्रकट होतील,यात नवल ते काय? अयोध्येतील सर्वांना च ते प्रिय ठरले होते…हा  रामनामाचा आणि रामसेवेचा महिमा.

काल दिनांक १२ फेब्रुवारी,२०२५ रोजी माघ पौर्णिमेचा मोठा उत्सव होता अयोध्येत…याच दिवशी महंत सत्येंद्र दास यांनी जीवनाची सांगता केली. आज दिनांक १३ फेब्रुवारी २०२५ रोजी त्यांचे पार्थिव शरयूच्या जलात समाधिस्त झाले! 

अशी रामसेवा घडलेले हे आयुष्य सर्वथा वंदनीय होते. प्रभू रामचंद्र त्यांना त्यांच्या चरणाशी कायम स्थान देतील,यात शंका नाही…कारण प्रभूंच्या चरणी त्यांनी आपले अवघे जीवित व्यतीत केले होते….एवढे पुण्यफल तर प्राप्त होणारच! 

भावपूर्ण श्रद्धांजली…आचार्य महंत सत्येंद्र दासजी महाराज! जय श्री राम! 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ येड्या हो sssss ‘Hug Day‘ याला म्हणतात! – लेखक : डॉ. धनंजय देशपांडे ☆ सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

? इंद्रधनुष्य ?

येड्या हो sssss ‘Hug Day‘ याला म्हणतात! – लेखक : डॉ. धनंजय देशपांडे ☆ सुश्री प्रभा हर्षे  ☆

hug day म्हणजे काय असतं

हे रावणाशी लढाई जिंकून झाल्यावर

हनुमानाला मिठीत घेतलेल्या श्रीरामाला विचारा 

की Hug Day म्हणजे काय?

*

Hug Day म्हणजे काय असतं

हे त्या अफझलखानाच्या थडग्याला जाऊन विचारा 

ते हि सांगेल Hug Day म्हणजे काय असतं!

*

Hug डे म्हणजे काय असतं

हे त्या पोह्याच्या पुरचुंडीला विचारा,

जिने कृष्ण सुदामाची मिठी पाहिलेली 

ती हि सांगेल Hug Day म्हणजे काय असतं

*

Hug Day म्हणजे काय असतं

हे त्या झाडांना विचारून पहा

ज्यांच्या रक्षणासाठी “चिपको” आंदोलन करून

महिलांनी झाडांना मिठी मारलेली पाहिलीय 

ती झाडेही सांगतील की 

Hug Day म्हणजे काय असतं 

*

Hug Day म्हणजे काय असतं

हे त्या रायगडाला विचारा 

ज्याने पश्चाताप झाल्यावर

माघारी आलेल्या शंभुराजांना

मिठीत घेणारे शिवाजी राजे पाहिलेत 

तो रायगडीचा महालही सांगेल 

Hug Day म्हणजे काय असतं 

*

Hug Day म्हणजे काय असतं

हे त्या यज्ञातील उधाणलेल्या ज्वालाना विचारा 

ज्यांनी नेताजी पालकरला पुन्हा आपल्या धर्मांत घेऊन

मिठी मारणारे छत्रपती शिवाजी महाराज पाहिलेत 

त्या ज्वालाही सांगतील 

Hug Day म्हणजे काय असतं 

*

Hug Day म्हणजे काय हे

त्या जेल मधील भिंतींना पण विचारा

जेव्हा मेरा रंग दे बसंती म्हणत

भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू 

ह्यांनी एकमेकांना फासावर जाण्याआधी

एकदा घट्ट मिठी मारली असेल

*

Hug Day म्हणजे काय?

हे सीमेवर लढायला जाणाऱ्या त्या जवानांना सुद्धा विचारावं 

जो जाताना आपल्या आईला आलिंगन देऊन जातो.

आणि भारत मातेच्या रक्षणासाठी स्वतःचे प्राण पणाला लावतो.

*

असा असतो खरा Hug Day.. येड्याहो!

ते शिकूया, तशा मिठीचे संस्कार जपूया 

जय भवानी, जय शिवाजी…

*

लेखक : श्री डॉ. धनंजय देशपांडे (dd)

प्रस्तुती : सुश्री प्रभा हर्षे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares