☆ मला पद्मश्री पुरस्कार दिलाच पाहिजे… भाग २ ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆
(डॉक्टरांचे हे बोलणे ऐकून बंडूला विषयाचं गांभीर्य लक्षात आलं.) इथून पुढे —
“डॉक्टर साहेब, या प्लेटलेट्स गोळा कशा केल्या जातात ? प्लेटलेट्स देण्यासाठी दात्याचे काही निकष असतात का आणि प्लेटलेट्सचेही रक्तगट असतात का हो ?” – रजत.
— जरा शास्त्रीय आणि तर्कशुद्ध महत्त्वाचे प्रश्न ऐकून डॉक्टरसाहेबांची कळी खुलली आणि ते समजावून सांगू लागले.—-
“रक्तदानापेक्षा प्लेटलेट डोनेशनचे निकष कांकणभर जास्तच काटेकोर असतात. दाता वैद्यकीयदृष्ट्या सुदृढ असावा लागतोच, शिवाय डोनेशनच्या किमान ४८ तास आधीपासून दारू पिणे, तंबाखू सेवन हे सगळंच कटाक्षाने बंद ठेवावे लागते. हिमोग्लोबीन १२.५ पेक्षा अधिक असावं लागतं आणि प्लेटलेट संख्या प्रति मिलीलिटर २,६५,००० पेक्षा जास्त असावी लागते.– दात्याच्या शरीरातून रक्त काढणे सुरू करतात, यंत्राद्वारे त्या रक्तातून प्लेटलेट वेगळ्या केल्या जातात आणि उरलेले रक्त पुन्हा दात्याच्या शरीरात सोडलं जातं. (डायलिसिस करताना कसं शरीरातील रक्त काढलं जातं, शुद्ध केलं जातं आणि ते शुद्ध रक्त पुन्हा शरीरात सोडलं जातं, तसंच.) साधारण एक दीड तास ही प्रक्रिया चालू राहते. तसेच ही प्रक्रिया करणाऱ्या यंत्राचा संच हा फक्त एकदाच वापरला जातो. व त्या वापरानंतर तो मोडीत काढला जातो (only one time use, disposed after single use). त्यामुळे दात्याला संसर्ग होण्याची तिळमात्रही शक्यता नसते. रक्तदानात तुमच्या शरीरातून रक्त काढून घेतले जाते, म्हणून तुम्हाला recovery साठी तीन महिन्यांपर्यंत परत रक्तदान करता येत नाही. प्लेटलेट डोनेशन मात्र दर पंधरा दिवसांनी करता येते. आणि तसं ते करावंही, आज प्रचंड गरज आहे. आणि हो, प्लेटलेट्सना रक्तगटाचं बंधन नसतं, बरं का ! कोणत्याही रक्तगटाच्या प्लेटलेट्स कोणत्याही रक्तगटाच्या पेशंटना चालतात. करोना काळात पेशंटची मोठी गैरसोय होत होती, अशा वेळी व जेव्हा कधी तातडीची गरज असेल, तर दाता सुदृढ असेल तर डबल डोनेशनही घेतले जाते. आणि हो, आपण दिलेल्या प्लेटलेट्स कोणाला दिल्या गेल्या हे दात्याला कधीच सांगितले जात नाही. आजवर फक्त एकदाच हा रिवाज मोडला गेला. ज्यांच्या सांगण्यावरून मी त्या दिवशी डोनेशनला गेलो होतो त्या बालविभागाच्या प्रमुखांनी दुसऱ्या दिवशी ज्या लहानग्याला माझ्या प्लेटलेट्स दिल्या होत्या, त्याच्या पालकांचा आलेला आभाराचा मेसेज मला forward केला होता. दानाच्या प्रक्रियेसाठी इतका वेळ देणं, त्या मोठ्या सुईच्या वेदना सहन करणे, आणि पुन्हा पंधरा दिवसांनी हीच प्रोसेस रिपीट करणं – तुम्हाला अनाकलनीय वाटेल कदाचित, पण आपली ही कसरत कोणाचा तरी जीव वाचवत आहे, ही भावना, ही जाणीव आपल्याला प्रेरणा देत रहाते. दान केलेले रक्त तीन आठवड्यांपर्यंत साठवता येते, पण प्लेटलेट्स फक्त पाचच दिवस टिकू शकतात, त्यामुळे आणखीन दाते पुढे येण्याची नितांत गरज आहे.”
— डॉक्टर सुयोग भरभरुन सांगत होते.
घरी परतताना, चक्क बंड्याही शांत होता, रजत मोबाईलमध्ये डोकं खुपसून बसला होता, आणि एकदम तो उद्गारला, “बंडूशेठ, तू म्हणतोस तेच खरं. तो ब्राझीलचा चिकिन्हो स्कार्पा आणि हे डॉक्टर सुयोग दोघेही एकाच माळेचे मणी आहेत. — त्या चिकिन्होने गाडी जमिनीत गाडायचा गाजावाजा केला, एवढंच तुला आठवलं. पण त्याने पुढे काय म्हटलं, ठाऊक आहे का तुला ?”
बंड्यांनं नकारार्थी मान हलवली.
” तो म्हणाला, ही गाडी माझ्या मृत्यूनंतर मला उपयोगी पडेल म्हणून मी गाडायचे ठरवले, तर तुम्ही माझी हुर्यो उडवलीत, मला नावं ठेवलीत, माझी अक्कल काढलीत. मग तुमच्या मृत्यूनंतर तुमचे अनमोल अवयव तुम्ही जेव्हा जमिनीत गाडता, तेव्हा तुमची ही बुद्धी कुठे जाते ? त्यापेक्षा अवयव दान करा, अन्य गरजूंना मदत करा.”
“ अरे Organ donation ला प्रसिद्धी देत होता तो. तसंच या डॉक्टरांना स्वतःच्या कौतुकाची, मानमरातबाची हौस नाहीये. पण असं हे आचरट title पाहिलं, असं heading पाहिलं, असा मथळा पाहिला, की कोण आहे हा टिकोजीराव ? या उत्सुकतेने तरी लोकं ही बातमी वाचतील आणि प्लेटलेट डोनेशनला प्रेरित होतील – उद्युक्त होतील, म्हणून त्यांचा हा खटाटोप. – तुला माहित आहे का, डॉक्टरांनी आत्तापर्यंत तब्बल ७५ वेळा प्लेटलेट डोनेशन केले आहे ?”
— रजत विचारत होता, आणि बंड्या प्लेटलेट डोनेशन करण्यासाठी कोणाला संपर्क करायचा हे विचारणारा मेसेज सुयोग सरांना पाठवत होता.
— समाप्त —
(डॉ. सुयोग कुळकर्णी MD आयुर्वेद आणि त्यांनी ७५ वेळा केलेले प्लेटलेट डोनेशन ही १००% सत्य घटना आहे. प्लेटलेट डोनेशन या संदर्भात अधिक माहिती हवी असल्यास आपण डॉ. सुयोग यांना ९८२०२५९५६९ या क्रमांकावर अवश्य संपर्क करू शकता.)
☆ मला पद्मश्री पुरस्कार दिलाच पाहिजे… भाग १ ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆
पत्रकार रजत सरदेसाई एका MD (आयुर्वेद) डॉक्टरांची मुलाखत घ्यायला चालले होते. बरोबर त्यांचा मित्र बंड्या काळे होताच. डॉक्टरांनी मुलाखतीचे शीर्षक “मला पद्मश्री पुरस्कार दिलाच पाहिजे” हेच राहणार असेल तरच मुलाखत देईन असं म्हटल्याने हे दोघं बुचकळ्यात पडले होते. बंड्याला तर ब्राझीलमधील चिकिन्हो स्कार्पा या अब्जाधीशाची आठवण आली. त्याने, मृत्यूनंतरचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून, त्याच्या चार कोटी रुपयांच्या बेंटली गाडीचं शाही इतमामात दफन करायचं घोषित केलं होतं.
“तो स्कार्पा आणि हे डॉक्टर, दोघेही विक्षिप्तपणाबाबतीत एकाच माळेचे मणी दिसतायत,” असं म्हणत म्हणत, बंड्या आणि रजत, मुलाखत देणाऱ्या दादर, मुंबईच्या डॉ. सुयोग कुळकर्णी यांच्याकडे पोचले.
रजतने भेटल्याभेटल्या मुद्द्यालाच हात घातला, “सर, कटाक्षाने आयुर्वेदिकच प्रॅक्टिस करणारे म्हणून तुमचा छान नावलौकिक आहे. पण मुलाखतीचे शीर्षक हेच हवे हा तुमचा अट्टाहास का ? याबद्दल काही सांगाल का, प्लीज ?”
“होय. पहिल्याप्रथम मी हे स्पष्ट करू इच्छितो की लोकांचे प्राण वाचवल्याबद्दल मला कोणतेही प्रमाणपत्र अथवा पुरस्कार नकोय. तो तर माझा पेशाच आहे, त्याबद्दल मी फी – पैसे आकारतो. त्यामुळे त्याबद्दल वेगळा पुरस्कार मागणं, हे मला तरी पटत नाही. कदाचित माझं बोलणं तुम्हाला extreme वाटेल. पण असं आहे बघा की, खेळाडू असो, वा चित्रपट अभिनेता, किंवा अगदी एखादा शास्त्रज्ञ – या सगळ्या जणांना त्यांच्या उपजीविकेच्या साधनांसाठी उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल पद्म पुरस्कार दिले जात आहेत. पण मी जे काम करतो ते पूर्ण निस्वार्थीपणे, अगदी नव्या पैशाचाही फायदा न घेता. आणि शिवाय ते समाजाच्या प्रचंड उपयोगाचे आहे. म्हणूनच माझे ठाम प्रतिपादन आहे की ” मला पद्मश्री पुरस्कार दिलाच पाहिजे ! “ डॉक्टर शांतपणे पण आग्रहाने बोलत होते.
“पण असं तुम्ही काय जगावेगळं करता ?” न राहवून शेवटी बंड्याने मध्ये नाक खुपसलंच.
“मी प्लेटलेट डोनर आहे.”
बंड्याच्या चेहऱ्यावर भलं थोरलं प्रश्नचिन्ह.
“बंडूदादा, पांढऱ्या रक्तपेशी (white blood cells WBC), तांबड्या रक्तपेशी (red blood cells RBC) यांच्याप्रमाणे प्लेटलेट या आपल्या रक्तात असतात. WBC, RBC यांच्यापेक्षा आकारात खूपच लहान. एक मिलीलिटर रक्तात तब्बल अडीच लाखांहून जास्त प्लेटलेट्स असतात. जखम झाल्यावर आलेले रक्त थांबवणे हे यांचं प्रमुख काम,” रजतने थोडक्यात प्लेटलेट्सची कुंडली मांडली.
“हां, हां. ते त्या पलीकडच्या गल्लीतील राजूच्या वडिलांना डेंग्यू झाला होता, तेव्हा त्यांच्या या प्लेटलेट कमी झाल्या वगैरे ऐकलं होतं. अरे, पण रक्तदान ऐकलं होतं, ही प्लेटलेट डोनेशन काय भानगड आहे ?” बंडूतील शंकासूर काही शांत होईना.
“ज्या पेशंटच्या रक्तातील प्लेटलेट संख्या कमी आहे, अशांची जर मोठी शस्त्रक्रिया होणार असेल, किंवा काही अपघात वगैरे झाला असेल तर त्यांना प्लेटलेट्स द्याव्या लागतात. ” – डॉक्टर साहेब. “आणि दुसरा मोठा गट म्हणजे कॅन्सर पेशंट्सचा. कॅन्सर उपचारातील केमोथेरपीचा एक वाईट साईड इफेक्ट म्हणजे याने प्लेटलेट्सची संख्या लक्षणीयरित्या कमी होते.”
“सर, खरं सांगू का, मला एक कळलं नाही”, बंडू निरागसपणे आपलं घोडं पुढं दामटत होता, ” की समजा झाल्या रक्तातील प्लेटलेट्स कमी, तर एवढं काय आकाश कोसळणार आहे ? म्हणजे, तुम्ही म्हणता तसं ज्यांना अपघात झाला आहे, जखम झाली आहे, शस्त्रक्रिया झाली आहे अशांचं ठीक आहे एक वेळ, पण बाकी असा कुठे आपल्याला एवढा रक्तस्त्राव होतो की जो थांबवायला या अशा इतरांकडून घेतलेल्या प्लेटलेट्स घ्याव्या लागतील ?”
बंड्याच्या अश्या या un-diplomatic बोलण्याने रजत चांगलाच कावराबावरा झाला, पण त्याला आश्र्वस्त करत डॉक्टरसाहेब सांगू लागले, ” सर्वसामान्यांना कल्पना नसते पण दैनंदिन जीवनात असंख्य वेळा आपल्या शरीरात सूक्ष्म रक्तस्त्राव होत असतात. जोरात शिंकलात, किंवा शौचाला जरा जास्त जोर केलात तरी रक्तस्त्राव होतो. ज्यांच्या प्लेटलेट्सची संख्या सुयोग्य आहे, अशांच्या शरीरात हा रक्तस्त्राव इतक्या बेमालूमरीत्या आणि इतक्या सहजी आणि इतक्या लगेच थांबवला जातो की ते आपल्याला कळतही नाही आणि त्यामुळे त्याचं महत्त्वही उमगत नाही. पण जर हे छोटे छोटे रक्तस्त्राव थांबले नाहीत तर त्याचं पर्यवसान internal haemorrhage (हॅमरेज) मध्ये होतं आणि पेशंटच्या जीवालाही धोका होऊ शकतो. आणि कर्करोगाच्या पेशंटसची रोगप्रतिकार क्षमता अशीही कमी झाली असते, त्यामुळे त्यांच्याबाबतीत अधिक काळजी घेणं गरजेचं असतं.”
डॉक्टरांचे हे बोलणे ऐकून बंडूला विषयाचं गांभीर्य लक्षात आलं.
☆ गीत ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त २५ : ऋचा १ ते ७ ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆
☆
मण्डल १ – सूक्त २५ (वरुणसूक्त) – ऋचा १ ते ७
ऋषी – शुनःशेप आजीगर्ति : देवता – वरुण
ऋग्वेदातील पहिल्या मंडलातील पंचविसाव्या सूक्तात शुनःशेप आजीगर्ती या ऋषींनी वरुण देवतेला आवाहन केलेले असल्याने हे वरुणसूक्त म्हणून ज्ञात आहे. आज मी आपल्यासाठी वरुण देवतेला उद्देशून रचलेल्या पहिल्या सात ऋचा आणि त्यांचे मराठी गीत रुपांतर सादर करीत आहे.
(या ऋचांचा व्हिडीओ गीतरुपात युट्युबवर उपलब्ध आहे.. या व्हिडीओची लिंक देखील मी शेवटी देत आहे. हा व्हिडीओ ऐकावा, लाईक करावा आणि सर्वदूर प्रसारित करावा. कृपया माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करावे.)
☆ नृसिंह अवतार प्रकट झालेला खांब… ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆
नृसिंह अवतार प्रकट झालेला खांब पाकिस्तानात आहे …. पुण्याच्या सदाशिव पेठेतील जोशी वाड्यात श्री लक्ष्मीनृसिंह मंदिर आहे. या जोश्यांपैकी श्री अनंत जोशी यांना पाकिस्तानने त्यांच्या देशात येण्यास परवानगी दिली म्हणजेच व्हिसा दिला आणि हे जोशी मार्च २००४ मध्ये पाकिस्तानात गेले.
जिथे भगवान नरसिंह अवतरीत झाले, श्रीविष्णू यांचा हा अवतार ज्या ठिकाणी प्रकट झाला ती जागा त्यांना बघायची होती आणि ही त्यांची इच्छा पूर्ण झाली. श्री जोशी पाकिस्तानी पंजाबच्या मुल्तान भागात आले. येथील प्रल्हादपुरी मंदिरात ही पावन जागा आहे. या फोटोत जो स्तंभ दिसत आहे, तो तोच स्तंभ आहे ज्यातून श्रीनरसिंह, श्रीविष्णू यांचा पाचवा अवतार प्रकट झाला होता.
बर्याच जोशी कुळांचं श्रीनरसिंह हे कुलदैवत असतं. कदाचित या जोश्यांचंही असेल आणि आपल्या कुळाच्या ईष्ट दैवताचं मूळ स्थान बघण्याची यांची इच्छा असेल. फोटोत बहुतेक ते कुलदैवताच्या मूळ स्थानी जिथे हा स्तंभ फाकलेला आहे, म्हणजेच जिथून श्री नरसिंह स्तंभ फाडून बाहेर आले तिथे जलाभिषेक करत असावेत.
या जोश्यांचे अनेक आभार कारण त्यांच्यामुळेच हा खांब फोटोत का होईना बघता येत आहे. त्यांच्या या मुल्तान भेटीत त्यांच्यासमोर मुन्शी अब्दुल रहमान खान यांनी लिहिलेलं आणि उलूम-इस्लामिया-चाहलक यांनी प्रकाशित केलेलं “तारीख-ए-मुल्तान” नावाचं एक उर्दू पुस्तक प्रस्तुत करण्यात आलं. यातील थोडी अनुवादित माहिती मध्यंतरी वाचनात आली होती.
सप्तपुरी म्हणजेच काशी, अयोध्या, उज्जैन, मथुरा, हरिद्वार, द्वारका, कांची अशी अतिशय पावन ठिकाणं आज आपल्या देशात आहेत, असंच एक ठिकाण होतं मूलस्थान म्हणजेच मुल्तान. श्रीविष्णू आणि सूर्यदेव यांची भूमी असलेल्या या आद्यस्थानाचा (आद्यस्थान हे या मुल्तानचं कितीतरी नावांपैकी एक नाव) इतिहास खूप मोठा आणि महत्त्वाचा आहे. आज श्रीमंत देवस्थानांमध्ये तिरुपती बालाजी, पद्मनाभ स्वामी मंदिर यांची नावे घेतली जातात. पण यांच्यापेक्षाही संपन्न देवस्थान जर कुठलं होतं, तर ते हिंदूंसाठी सर्वात महत्त्वाचं असणारं आदित्याचं देवालय – मुल्तानचं सूर्य मंदिर.
संग्राहक : श्री अनंत केळकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈
ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदा ते शुद्ध दशमी पर्यंत गंङ्गा नदीचा जो उत्सव करतात, त्याला दशहरा किंवा गङ्गोत्सव म्हणतात.
भगीरथांच्या प्रदीर्घ प्रयत्नांती , ज्येष्ठ शुद्ध दशमीस, मंगळवारी, हस्त नक्षत्रावर गङ्गा नदीचे पृथ्वीवर अवतरण झाले.
या १० दिवसांमधील, गङ्गा- स्नानाच्या योगाने 10 पातकांचे, रोज एक याप्रमाणे क्षालन होते, म्हणून याला “दश-हरा” म्हणतात.
यालाच “गङ्गावतरण” असेही म्हणतात. गङ्गेचे अवतरण, हिंदू लोक, हा “दशहरा-काल” एक सण म्हणून साजरा करतात. गङ्गेचे, स्वर्गातून पृथ्वीवर अवतरण झाले. हा सण दहा दिवस साजरा केला जातो. ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदा ते दशमी.
माँ गङ्गा नदीला, संपूर्ण विश्वात सर्वात पवित्र नदी मानले जाते.
सर्व नद्यांचे , मनुष्य जातीवर खूपच उपकार आहेत. सर्व नद्या पवित्र व साक्षात जलदेवता आहेत. त्यांचे प्रती आदरभाव व्यक्त करण्यासाठी, नद्यांची पूजा केली जाते.
गङ्गा नदीने आपल्या पिताश्रींना, म्हणजे श्री शिवजींना विचारले, की सर्व लोक माझ्या मध्ये येऊन स्नान करून आपली पापे धुवून टाकतात. माझ्याकडे, साठलेल्या या सर्व पापांचे, निर्मूलन करण्यासाठी, मी काय करू? तेव्हा श्रीशिवजींनी सांगितले, की तू श्रीनर्मदा- मैया मध्ये जाऊन स्नान कर. व त्यायोगे, तू , स्वतःला शुद्ध करून घेऊ शकशील; कारण श्रीनर्ममदा ही स्वतःच पापनाशिनी आहे. त्यामुळेच या दशहराच्या कालखंडात श्री नर्मदा मैया मध्ये स्नान केल्यामुळे गङ्गास्नानाचेही पुण्य लाभते.
काही ऋषींनी असेही पाहिले आहे की, श्री श्रीगङ्गा- मैय्या ही काळ्या गाईच्या रुपाने, श्री नर्मदा मैया मध्ये स्नानासाठी येते व परत जाताना ती शुभ्र रंगाची होऊन जाते. म्हणून या गङ्गा दशहराच्या काळात, गङ्गामैया, नर्मदा मैया किंवा त्यांच्या किनारी जाणे शक्य नसेल, तर कोणत्याही नदीमध्ये त्या दोघींचे नाव घेऊन स्वतःच्या पापनाशनासाठी स्नान करावे. पुण्यशालिनी अशा सप्त नद्यांचे स्मरण करावे.
आपल्या निवासाच्या ठिकाणी जी नदी आहे, तिचेसुद्धा आपल्यावर खूप मोठे ऋण असते. तिची पूजा करावी. मैय्याला खस (वाळा), कापूर, सुगंधी द्रव्ये अर्पण करावीत. ओटी भरावी. नैवेद्य दाखवावा. ऋतुकालोद्भव अंबा अर्पण करावा. मैय्याला भरवावे. काठावर दिवे लावावे. त्यांची स्तोत्रे म्हणावीत.
गावातील सांडपाणी नदीत जाणार नाही यासाठी प्रयत्न करावेत.
आद्य श्री शंकराचार्यांनी गङ्गाष्टक, गङ्गा स्तोत्र, यमुनाष्टक, नर्मदाष्टक, मणिकर्णिकाष्टक अशा स्तोत्रांची रचना केलेली आहे. नद्यांवरती इतरही बरीच काही स्तोत्रे आहेत. त्यांचे पठण करावे. श्री जगन्नाथ पंडित यांनी गङ्गालहरी स्तोत्र याची सुंदर रचना केलेली आहे. श्री शंकराचार्य व श्री वासुदेवानंद सरस्वती यांनी नर्मदा लहरींची रचना केलेली आहे. श्री वासुदेवानंद सरस्वती यांनी कृष्णा लहरींची पण रचना केलेली आहे. या स्तोत्रांमध्ये या नद्यांची स्तुती केलेली आहे, महती सांगितलेली आहे व फलश्रुती पण सांगितलेली आहे. तरी या दहा दिवसात अशा प्रकारे उपासना करून स्वतःचा उद्धार करून घ्यावा. श्री जगन्नाथ पंडितांनी गङ्गा लहरी रचताना गङ्गास्तुतीच्या सहाय्याने स्वतःचा उद्धार करून घेतलेला आहेच. ज्या लोकांना, योग मार्गाने आपल्या शरीरातील नाड्यांची शुद्धता करून घेता येणे जवळ जवळ अशक्य असते, त्यांना या नद्यांच्या उपासनेमुळे, स्तवनामुळे, त्या प्रकारची नाडी शुद्धी प्राप्त करून घेता येत असते, असे शास्त्र वचन आहे, भागवत पुराणात याचा उल्लेख आहे. या काळामध्ये नदीमध्ये स्नान, जप जाप्य उपासना व दान करणे या गोष्टींमुळे उच्च दर्जाची अध्यात्मिकता प्राप्त होते.
पूर्वीचे काळी, म्हणजे सुमारे 60-70 वर्षांपूर्वी, मंदिरांमधून, जसे आपण नवरात्र साजरे करतो, तसे गङ्गा दशहरा काळांत, दहा दिवस कीर्तन, जागरण, भागवत श्रवण, भगवत्कथा, जप जाप्य, अभिषेक होत असत.
माझी आई “मंगला कुलकर्णी” ही, कीर्तनकार असल्याने या दशहराच्या काळात लहानपणी, तिची कीर्तने अनेक वेळा ऐकण्याचे भाग्य मला लाभले होते. कारण मी तिला पेटीची साथ करत असे. ती उच्च विद्या विभूषित असल्याने व प्रोफेसर असल्याने तिचे अर्थार्जन बऱ्यापैकी उच्च प्रतीचे होते. कीर्तनातून मिळालेले पैसे, स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी वापरायचे नाहीत, असे तिने ठरवले असल्याने, त्या संपत्तीचा, तिने विविध प्रकारच्या दानांसाठी विनियोग केला होता.
अशा दशहराच्या काळात, एक प्रकारचे वाचिक तप म्हणून, कोणाचीही निंदा तसेच चहाडी, न करणे यांसारखी बंधने, स्वतःवर लादून घेणारी बरीच मंडळी असतात.
या दहा दिवसांच्या काळात प्रामुख्याने श्री गङ्गामैया, श्री नर्मदा मैया, श्री शिवशंभू व भगवान श्री विष्णू यांची उपासना जास्तीत जास्त प्रमाणात करण्याचा प्रघात आहे. अशाप्रकारे या पवित्र कालावधीमध्ये जास्तीत जास्त उपासना करून आपण आपला अध्यात्मिक उत्कर्ष साधण्याचा प्रयत्न करू या.
या काळात ज्या सोप्या मंत्रांचा जप करावा ते असे…
१) हरगङ्गे भागीरथी।।
२) नर्मदे हर।।
३) नमः शिवाय।।
४) राम कृष्ण हरी गोविंद।।
ज्यांना येते त्यांनी इतर विविध प्रकारची गीते, स्तोत्रे, मंत्र यांचे पठण करावे.
या काळात गंगाकिनारी किंवा नर्मदा किनारी स्थित असलेल्या तीर्थस्नानांचे दर्शन घ्यावे.
तसेच बारा ज्योतिर्लिंगांपैकी एखाद्या ज्योतिर्लिंगाचे आणि श्री महाविष्णूंच्या एखाद्या प्रसिद्ध मंदिराचे दर्शन घ्यावे.
ज्यांना यज्ञयाग इ. पुण्यकर्मे करणे, कोणत्याही कारणांमुळे करणे अशक्य असेल त्यांनी निदान अशी कर्मे जिथे नेहमी/ मोठ्या प्रमाणात केली जातात, अशा ठिकाणी स्वतःच्या आर्थिक कुवतीनुसार त्या हवनासाठी ज्या वस्तू लागतात, त्यांचे दान अवश्य करावे.
तेही खूप पुण्यवर्धक असते.
२० मे ते ३० मे पर्यंत या वर्षीचा गंगा दशहराचा पुण्यकाल आहे.
☆ “I want to be able to be alone” ☆ माहिती संकलन : मंजुषा सुनीत मुळे☆
I want to be able to be alone, to find it nourishing- not just waiting. –SUSAN SONTAG
साधारणपणे साठपासष्ठीच्या वयाच्या व्यक्ती कोणत्याही कारणाने एकत्र आल्या तरी त्यांच्या बोलण्यात एकटेपणाचा विषय आल्याशिवाय राहत नाही. —- या दृष्टीने सध्याचे समाज जीवन पाहिले तर त्यात सरळ सरळ दोन गट दिसून येतात. वेगाने बदलत चाललेल्या जीवनशैलीची नवी मूल्ये, नवे विचार अगदी सहजी आत्मसात करून, भावनिक गोष्टींमध्ये न गुंतता स्वतःला जो विचार सोयीचा आणि फायद्याचा वाटतो तो पटकन स्वीकारून पुढे चालणारा एक गट- तरुण आणि मध्यमवयीन लोकांचा !…… तर झपाट्याने बदलत चाललेली परिस्थिती समजत असली, अनुभवाला येत असली, तरी त्याच्याकडे दुर्लक्ष करून, पुढे सर्व काही ठीकच होणार आहे -असणार आहे असा सोयीचा विचार करून, काळाची पावले न ओळखता, बेसावधपणे जगणारा एक गट— अर्थातच वृद्धांचा !
हे प्रकर्षाने जाणवण्याचे कारण म्हणजे, ६ मे २०२३ च्या टाइम्स ऑफ इंडियाचा अग्रलेख ! विषय आहे– एकाकीपणा —- Loneliness. संपादकीयामधे त्यांनी स्पष्ट लिहिले आहे की, ‘ Young people prefer new age autonomy over some idealised intergenerational families cohesion’.
वृद्ध, मुले आणि नातवंडे सगळ्यांनी एकत्र बरोबर राहणे आता जवळजवळ नाहीसे होताना दिसते. एवढेच नव्हे तर एका शहरात किंवा एका देशात पण ज्येष्ठांबरोबर रहात असणारे तरुणांचे प्रमाण प्रचंड वेगाने कमी होताना दिसते आहे. भारतामध्ये तरुणांची संख्या अधिक असल्यामुळे जो फायदा देशाला आणि मुलांना होतो आहे, त्याच्या चर्चा होताना आपण वाचतो आणि ऐकतो आहे. तरुणांची, काम करणाऱ्यांची संख्या इतर देशांमध्ये खूप कमी झाली आहे. त्यामुळे ज्यांना परदेशात जाण्याची इच्छा आहे त्यांना अक्षरशः रेड कार्पेट ट्रीटमेंट आहे असे म्हटले तर वावगे होणार नाही. या पार्श्वभूमीवर मनाने अजूनही भूतकाळातच राहणाऱ्या, आपले म्हातारपण विनात्रासाचे जाणारच आहे असा ठाम विश्वास असणाऱ्या वृद्धांनी खरोखरीच जागे होण्याची गरज आहे. अमेरिकेच्या वैद्यकीय क्षेत्रात सर्वात उच्चपदस्थ व्यक्ती म्हणजे US Surgeon General. सध्याचे सर्जन जनरल विवेक मूर्ती (एम.डी) यांनी एक ॲडव्हायझरी नुकतीच प्रसिद्ध केली आहे. त्यात त्यांनी लिहिले आहे की, धूम्रपानासारखाच आणि तितकाच, एकाकीपणाही धोकादायक आहे. त्यामुळे व्यक्तीला हृदयविकार, अर्धांग वायू, डिमेन्शिया यासारखे रोग होण्याची शक्यता वाढते. पण सध्या घरात बोलायला माणसे नाहीत आणि असली तरी त्यांना गप्पा मारायला वेळ नाही अशी परिस्थिती ! मग वेळ घालवण्यासाठी वृद्ध मोबाईलच्या विळख्यात सापडतात. अशा व्यक्तींना मानसिक रोग होण्याचा धोका अधिक आहे हे स्वतः ज्येष्ठांनी लक्षात घ्यायला हवे.
घरात माणसे उपलब्ध नसतील तर आपल्याला चार चौघांमध्ये सुरक्षितपणे राहता येण्यासाठी निवासाचे काही वेगळे पर्याय शोधण्याची गरज आहे. तसेच जे या क्षेत्रात काम करत आहेत त्यांनीही वृद्धांना ती जाणीव प्रकर्षाने करून द्यायला हवीच आहे. ही जाणीव केवळ आर्थिकच नाही, तर अनेक स्तरावर करून घेणे आवश्यक आहे. मानसिक आणि शारीरिक आरोग्यासंदर्भात येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी बरोबर कोणीतरी असणे, किंवा अशी व्यक्ती वेळेवर उपलब्ध होणे, ही आजची मोठी गरज आहे. पण त्याची शक्यताही कमी होत चाललेली आहे. त्यासाठी सुरक्षितता आणि सोय यांची सांगड घालून पुढची वाटचाल करायला हवी आहे. यासाठीचा सध्या उपलब्ध असलेला एक मार्ग म्हणजे ‘ वृद्ध – निवास ! ‘ पूर्वी त्याला वृद्धाश्रम म्हणत. पण आता मात्र वृद्धाश्रमापेक्षा वृद्धनिवासच म्हणणे योग्य ठरेल…. वृद्धनिवासांबद्दल एक नकारात्मक अशी भावना सर्वांच्याच मनात आहे. वृद्धांच्या , मुलांच्या आणि समाजाच्याही मनामध्ये ! त्याचं कारण म्हणजे वृद्धाश्रमात राहिले तर मुले काळजी घेत नाहीत असा अर्थ काढून जगाकडून आपल्या मुलांना/कुटुंबाला नावे ठेवली जातील अशी भीती वृद्धांना वाटते. ही भीती खरी आहे का नाही हे सुद्धा तपासून पाहण्याची गरज कोणाला वाटत नाही..
यासाठी खरंतर वृद्ध- निवासाचा पर्याय नेमका कसा आहे?..तो जास्त सुखकर आणि सोयीचा कसा होऊ शकतो? ते समजून घेणे आवश्यक आहे. संपूर्ण माहिती मिळाली तर वेळ आल्यावर असा निर्णय घेणेही सोपे होऊ शकते ..
(हे सर्व मुद्दे लक्षात घेऊन यासाठी ‘वृद्धनिवास‘ या विषयावर ‘सनवर्ल्ड फॉर सिनीयर्स‘ या संस्थेतर्फे दि. २६ मे २०२३ रोजी पुण्यामध्ये सकाळी ९.०० ते संध्याकाळी ५.०० या वेळात मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. —
मार्गदर्शक:-वृद्ध कल्याण शास्त्र तज्ञ, वृद्धाश्रमाच्या व्यवस्थापनावर पीएच.डी पदवी प्राप्त केलेल्या डॉ. रोहिणी पटवर्धन.—- स्वतः वृद्धांनी, पन्नाशीच्या पुढच्या होऊ घातलेल्या वृद्धांनी, वृद्ध सेवा क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांनी ही माहिती जाणून घेणे नक्कीच उपयुक्त ठरेल.)
इतिहासात डोकावताना “न्यूयॉर्क मँगो पल्प पार्टी” बद्दल समजले ते असे —-
एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला आपल्या येथील काही होतकरू तरुणांनी अमेरिकेतील बाजारपेठेत आमरस निर्यात करायचा ठरवला होता. त्या लोकांसाठी नवीन असणारा हा पदार्थ तिकडे हातोहात खपेल आणि आपल्या पदरी चार पैसे पडतील अशी त्यांची अपेक्षा होती. आपल्या येथील तेव्हाची सुप्त बाजारपेठ आणि भरघोस येणारे आंबे बघता त्यांची अपेक्षा काही चुकीची नव्हती. त्याकाळी अमेरिकेत आपला व्यवसाय स्थिरस्थावर करण्याच्या प्रयत्नात असणारे श्री. नानासाहेब जवळकर यांनी, त्या रसाचे वितरण अमेरिकेत करण्याची जबाबदारी स्वीकारली होती. भारतातून पाठवलेले आमरसाचे पिंप जेव्हा न्यूयॉर्क किनारी आले, तेव्हा खुद्द नानासाहेब त्यांची डिलिव्हरी घ्यायला गेले होते. तिथल्या कस्टम अधिकाऱ्यांनी त्यांना विचारलं “ हे काय आहे ? “
नानासाहेबांनी रसाची इत्यंभूत माहिती त्यांना दिली आणि त्याची चव घेण्याचा आग्रह केला. आमरस चाखल्यावर कस्टम अधिकारी विचारात पडले आणि नानासाहेबांना म्हणाले, “ हे प्रकरण भलतंच चविष्ट आहे आणि याचं व्यसन जर इतद्देशिय लोकांना लागले तर आमचे कष्टाचे डॉलर तुमच्या देशात जाऊन तुमची अर्थव्यवस्था उभारी घेईल. आमच्या देशाच्या हितासाठी हा रस इकडे विकायची परवानगी मी देऊ शकत नाही. मला माफ करा. “ नानासाहेबांनी बऱ्याच विनवण्या केल्या पण अधिकारी बधले नाहीत. त्यांनी आमरसाची सगळी पिंपं नाल्यात ओतून दिली. या घटनेला तिकडे “न्यूयॉर्क मँगो पल्प पार्टी” म्हणून ओळखले जाते. त्या घटनेचा फोटो आज मी इथे पोस्ट करत आहे. आमचे मित्र उद्योगभूषण यदुनाथ जवळकर यांचे नानासाहेब हे पणजोबा. त्यांच्याकडून आम्हाला ही घटना ज्ञात झाली.
संग्राहक : श्री सुहास सोहोनी
रत्नागिरी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈