मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “रामदासी झरे…”  – लेखक – श्री धनंजय केळकर ☆ श्री सुनीत मुळे ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ “रामदासी झरे”  – लेखक – श्री धनंजय केळकर ☆ श्री सुनीत मुळे ☆

सगळ्यांना दासबोध आणि मनाच्या श्लोकांपुरतेच माहीत आहेत समर्थ रामदास !

पण त्यांची स्वराज्यासाठीची कामगिरी फारशी कोणाला माहीत नाही.

संन्यासी, एक भगवी छाटी, कमंडलू, काखेतील कुबडी आणि समर्थ लंगोट, एव्हढीच त्यांची संपत्ती..

स्नानाचे काय? झोपायचे कुठे? समर्थांनी हा प्रश्न सोडवतानाच महाराजांसाठी सैन्य तयार केले.

समर्थांनी गावोगाव मारुती मंदिरांची स्थापना केली. यातील बहुतेक मंदिरांमध्ये तळघरे आणि भुयारे आहेत. नाथमाधवांच्या कादंबऱ्यात याचे वर्णन आढळते.

प्रत्येक मंदिराला लागूनच एक व्यायाम शाळा. हनुमानाची उपासना म्हणजेच बलदंड शरीर, हा मंत्र त्यांनी महाराष्ट्राला दिला.

गावोगाव तरुण पोरे या आखाड्यात घुमू लागली. दंड बैठका, फरी गदगा, ढाल तलवार शिकू लागली. महाराजांचा मावळा बलदंड आणि शस्त्रनिपुण होत होता.

पन्हाळगडापासून विशाळगडापर्यंत धावत जायचे आणि नंतर रात्रभर लढत गड गाठायचा. पावन खिंड लढवायची. ही काटकता आणि ताकद याच आखाड्यात तयार झाली.

बजरंगबलीकी जय!

रामदासी झरे हा त्यांचा दुसरा अद्भुत खेळ.

आम्ही गोव्याला जात असताना प्रधानगुरुजींनी गाडी थांबवायला सांगितली. गाडी बंद करून सगळ्यांना बाजूच्या झाडीच्या बाजूला उभे केले, आणि विचारले, “काही ऐकू येतंय का?”

गाडीच्या आवाजानी आमचे कान बधीर झाले असावेत. काहीच ऐकू येईना. ते आम्हाला त्या झुडपांच्या मागे घेऊन गेले.

अहो आश्चर्यम्….

हायवेवरील त्या झुडुपांच्या मागे एक दोन फूट रुंदीचा खळाळून वाहणारा स्वच्छ पाण्याचा झरा होता.

हाच तो रामदासी झरा. सगळ्या महामार्गांवर दर बारा कोसांवर समर्थांनी असे झरे शोधले आहेत, तयार केले आहेत. संन्याशांना स्नानसंध्या करायला आणि राजांच्या फौजेला कूच करत असताना स्वच्छ पाण्याचा पुरवठा करणारे, बारमाही खळाळून वाहणारे रामदासी झरे. आजही हे महाराष्ट्राचे वैभव खळाळून वहात आहे.

माहितगाराशिवाय कळणार नाहीत, असे रामदासी झरे. बहिर्जीच्या हेरखात्याला, हे माहीत असत. मारुती मंदिरातील तळघरे आणि भुयारे त्यांच्या कामाला यायची. रामदासी झरे सैन्याला पाणी पुरवायचे.

राजे स्वराज्य उभारणी करत होते आणि समर्थ सैन्य तयार करत होते. दास मारुतीची उपासना करणारे मावळेच, राजांसाठी जीव देणारे जिवलग असे तयार झाले.

समर्थांच्या कुबडीत गुप्ती असायची असे म्हणतात. तेव्हापासून लोकमान्य टिळक, स्वातंत्रवीर सावरकर, डॉक्टर हेडगेवार, योगी अरबिंदो घोष, सेनापती बापट, नेताजी सुभाषचंद्र घोष आदि सगळे राजकीय नेते हे राजकारण, क्रांतीकार्य आणि योग, अध्यात्म यात सहज संचार करणारे होते. संन्याशाचा संसार म्हणजेच जगाचा संसार, ही उक्ती या सगळ्यांनी सार्थ केली.

महाराजांच्या हिंदवी स्वराज्याची ही पुढील साखळी. आपणही त्याच मालिकेतील लढवय्ये बनूयात..

भारतमाताकी जय.. !!

लेखक : श्री धनंजय केळकर

प्रस्तुती : श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “प्लूटो दिन…” – लेखक – अज्ञात ☆ श्री सुनीत मुळे ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ “प्लूटो दिन”  – लेखक – अज्ञात ☆ श्री सुनीत मुळे ☆

प्लूटो दिन दरवर्षी 18 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. 1930 साली क्लाइड टॉमबॉग या खगोलशास्त्रज्ञाने प्लूटो ग्रहाचा शोध लावला आणि तो सौरमालेतील नववा ग्रह म्हणून ओळखला गेला. मात्र, 2006 मध्ये आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्रीय संघटनेने (IAU) प्लूटोला “बटू ग्रह” (Dwarf Planet) म्हणून पुनर्वर्गीकृत केले.

या दिवसाचे महत्त्व म्हणजे खगोलशास्त्रातील मोठी शोधयात्रा आणि प्लूटोच्या प्रवासाचा इतिहास. नासाने पाठवलेल्या “न्यू होरायझन्स” या अंतराळयानाने प्लूटोचे विस्तृत फोटो आणि माहिती पृथ्वीपर्यंत पोहोचवली.

लेखक : अज्ञात

प्रस्तुती : श्री सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “थोडं अजून”… ते… “Unlimited” – लेखक : श्री क्षितिज दाते ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर☆

श्री मोहन निमोणकर 

? इंद्रधनुष्य ?

☆ “थोडं अजून”… ते… “Unlimited” – लेखक : श्री क्षितिज दाते ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर

Unlimited… ???…

Unlimited ही थोडीशी पुस्तकी संज्ञा आहे.. आणि तितकीच फसवी देखील…. जी नाही हे सिद्ध करणं theoretically कदाचित शक्य नसेल पण practically विचार केला तर या जगात मुळात “Unlimited” असं काही नसतंच….

Upper Limit मात्र कमी जास्त होऊ शकतं…. म्हणजे कुठलं ना कुठलं Limit हे असतंच… उदाहरणार्थ जेव्हा आपण Limited थाळी खायला जातो तेव्हा हॉटेल मालकांनी ठरवलेलं Limit असतं आणि Unlimited थाळी खायला जातो तेव्हा आपलं म्हणजे खाणाऱ्यांचं Limit असतं…. जे व्यक्तीपरत्वे कमी जास्त असू शकतं…. एरवी घरी २ पोळ्या खाणारा तिथे ५ खाईल, ८ खाईल… किंवा ५-६ च्या ऐवजी एकदम २१ गुलाबजाम सुद्धा खाईल…. त्यामुळे थाळी Unlimited असली तरी शेवटी Limit हे असतंच… आजकाल मिळणाऱ्या Unlimited data plan चं ही तसंच… कोणी 5 GB वापरेल तर कोणी 500 GB… तरी देखील Unlimited च्या या चक्रात आपण अडकतोच…

या सगळ्याची सुरुवात नेमकी कशी आणि कुठून झाली असेल असा विचार करायला लागल्यावर एकदम डोळ्यासमोर आली ती बर्फाच्या गोळ्याची गाडी आणि आणि तिथे उभं राहून गोळा खाणारा लहानपणीचा मी…… गोळा खाताना 

“ भैय्या.. थोडा शरबत डालो… आणि…. भैय्या… थोडा बरफ डालो… असं म्हणत, एका गोळ्याच्या किमतीत जवळ जवळ दिड गोळा खाण्याचा आनंद काही वेगळाच असायचा…

तेव्हा लक्षात आलं की आपल्याला आपल्याकडे जे आहे त्यापेक्षा नेहमी “थोडं अजून “ हवं असतं… ते मिळवण्यात जास्त आनंद असतो…. मग अशा “थोडा है.. थोडे की जरुरत है” प्रकारचे अनेक प्रसंग डोळ्यासमोर आले आणि ही गोष्ट सर्वव्यापी आहे हे पक्कं झालं…

दुधवाल्या काकांनी दुधात कितीही पाणी घातलं तरी ठरलेलं दूध दिल्यानंतर उगाच माप किटलीत घालून थोडसं extra दुध पातेल्यात ओतल्यावर चमकणारा गृहिणींचा चेहरा…

परीक्षा संपल्याची वेळ होऊन सुद्धा बाकीच्या विद्यार्थ्यांचे पेपर गोळा करेपर्यंत supervisor नी दिलेला बोनस वेळ मिळाल्यावर आनंदी होणारा विद्यार्थी…

भाजी घेतल्यावर भाजीवाल्यांनी उगाच बांधून दिलेली थोडीशी मिरची – कोथिंबीरिची पुडी घेताना खुश होणारे कुठलेसे आजोबा….

रात्रभर गाढ झोपूनही सकाळी अलार्म वाजल्यानंतर “ शेवटची ५ मिनिटं “ झोपण्यात खरं समाधान मिळतं हे कुणीही अमान्य करणार नाही..

शनिवार – रविवार सुट्टी मिळूनही जोडून सोमवारी एखादी सार्वजनिक सुट्टी आली तर तिचं स्वागतच असतं…

Due Date साठी मुबलक वेळ मिळूनही deadline नंतर मिळणारा १-२ दिवसाचा Grace period महत्वाचा वाटतो…

४ तासांची संगीत मैफिल ऐकूनही शेवटी फर्माईश म्हणून २ मिनिटांचा गायला जाणारा एखादा अंतरा हवाहवासा वाटतो…

पोटभर पाणीपुरी, शेवपुरी, भेळ खाऊन सुद्धा शेवटच्या “मसाला पुरीचा” पूर्णविराम मिळाल्याशिवाय मन तृप्त होत नाही…. ही आणि अशी अनेक उदाहरणं…

तेव्हा मनुष्य प्राण्याची हीच “ थोडं अजून “ असलेली मानसिकता हळूहळू व्यापारी वर्गानी, विक्रेत्यांनी En-cash केली… आणि यातून पुढे त्याच किमतीत १० % जास्त टूथपेस्ट किंवा पावडर दिली जाऊ लागली… पुढे पुढे फ्री चा जमाना आला… साबणावर पेन फ्री… चहा बरोबर बरणी फ्री ते अगदी Buy 3 get 1 फ्री… वगैरे वगैरे… वेगवेगळ्या वस्तूंसाठी, वेगवेगळ्या ग्राहक वर्गासाठी विविध ऑफरचं खतपाणी घालून हे “ थोडं अजून “ मानसिकतेचं झाड व्यवस्थित रुजवलं आणि पद्धतशीर वाढवलं… एवढंच काय तर याच “ थोडं अजून “ चा फायदा घेत एका प्रथितयश शीतपेय कंपनीनी आपल्या जाहिरातीत “ ये दिल मांगे मोअर “ अशी tagline च दिली आणि त्यातूनही बक्कळ नफा कमावला… काळानुरूप payment modes बदलले आणि digital युगात या “ थोडं अजून “ ची जागा घेतली ती आजकाल मिळणाऱ्या Reward Points आणि cash back नी… एकंदरीत काय तर या मानसिकतेला वय, जात, धर्म, भाषा, लिंग, आर्थिक स्तर असं कुठलाही बंधन नसतं….

ठराविक सेल च्या दिवशी mall मध्ये उसळणारी तुडुंब गर्दी, women’s day ला स्वस्तात मिळणारी पाणीपुरी खायला अलिशान कार मधून येऊन रांग लावणाऱ्या महिला.. happy hours साठी धडपडणारे पुरुष, Introductory Offer चा लाभ घेण्यासाठी Online उड्या मारणारी e तरुणाई.. हे सगळे यावर शिक्कामोर्तबच करतात..

अखेरीस या अशा सगळ्याचा परमोच्च बिंदू… ज्याच्या अजून पुढे जाणं केवळ अशक्य…. ते म्हणजे अर्थात हे Unlimited प्रकरण…….. आपण सगळे या Unlimited च्या जाळ्यात कळत नकळत इतके ओढले गेलोय की बरेचदा केवळ जास्त मिळतंय म्हणून आपण नको असताना देखील घेतो आणि आपला कसा फायदा झाला असं मानसिक समाधान मिळवतो… कोण्या एका IT तज्ञाचं एक छान वाक्य आहे… “If you want to sell your product But there is no need.. then first create the need” …. एखाद्या गोष्टीची गरज नसेल तर आधी ती गरज निर्माण करा… म्हणजे मग गरज निर्माण झाल्यावर लोक ती गोष्ट आपणहून घेतील… पूर्वी ट्रंककॉल असताना किंवा मोबाईल च्या सुरुवातीच्या काळात फोनवर बोलणं महाग होतं… तेव्हा आपण अगदी मोजकं, कामापुरतं बोलायचो… मग हळूहळू ते बोलणं स्वस्त केलं आणि आपल्याला कामाशिवाय किंवा बरेचदा वायफळ बोलण्याची सवय लागली… भलीमोठी बिलं यायला लागली आणि ते स्वस्त करण्यासाठी आता आपण Unlimited calling plan घ्यायला लागलो…. home delivery करणं, AC, Car ते अगदी smart Phone… आधी या कधीच गरजा नव्हत्या पण आता सभोवतालची परिस्थिती अशी काही आहे की या गोष्टी आता चैन नाही तर गरज झालीय आणि म्हणून आपण त्यासाठी पैसे मोजतो…. अर्थात हे सगळं बदलत्या काळाप्रमाणे प्रगती पथाच्या दिशेने जाणारं असल्याने त्यात वावगं काही नाही…. तर… तशीच आता आपल्याया Unlimited ची सवय झालीय… इतकं की आता amusement park च्या तिकिटात सुद्धा आपल्याला Unlimited rides हव्या असतात…

एकीकडे आपण गरज नसतानाही बरेचदा उपलब्ध आहे म्हणून गरजेपेक्षा जास्त घेतो तर काहीना गरजे पुरतं देखील मिळत नाही हे वास्तव आहे…. अशाच एका Food Outlet च्या बाहेर ठेवलेल्या कचरा पेटीतून काही भूकेली लहान मुलं, लोकांनी टाकलेल्या Dish मधून “उरलेलं अन्न” वेचून खात होती…. ज्यांच्याकडे शून्य आहे त्यांना शून्यापेक्षा “थोडं अजून“ मिळावं असं वाटणारच ना…. “मन हेलावून” टाकणाऱ्या त्या प्रसंगानी ही जाणीव मात्र करून दिली की आपल्याकडे Unlimited असूनही कधी कधी आपण असमाधानी असतो पण इतरांनी टाकलेलं Limited अन्न कोणासाठीतरी Unlimited थाळी सारखं असतं आणि तेवढ्याश्यानी सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारं समाधान… तेही Unlimited असतं…

आपला प्रवास मात्र “थोडं अजून“ पासून सुरु होऊन “व्हाया Unlimited ” पुन्हा “थोडं अजून“ वर येतो…

लेखक : श्री क्षितिज दाते

ठाणे 

संग्राहक : श्री मोहन निमोणकर

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ भारतातली काही निवडक बिघडलेली वेडी माणसं… – माहिती संग्राहक : अज्ञात  ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर  ☆

सौ. बिल्वा शुभम् अकोलकर

? इंद्रधनुष्य ?

☆ भारतातली काही निवडक बिघडलेली वेडी माणसं… – माहिती संग्राहक : अज्ञात  ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर 

भारतातली काही निवडक बिघडलेली, वेडी माणसं.. !!!

ही माणसं अशा कामात गढून गेलेली असतात कि ज्यातून त्यांना स्वतःला काहीच मिळत नाही. उलट पाहणाऱ्यांच्या विचित्र नजरा सहन कराव्या लागतात. तरीही कोणीतरी आज्ञा दिली आहे अशा थाटात ते आपलं काम करत राहतात !!!

१) रायगड १००० वेळा चढून जायचा संकल्प गायक श्री सुरेश वाडकरांनी केला आणि आतापर्यंत साधारणपणे ९०० वेळा ते रायगड चढले आहेत. सोबत अनेकांना घेऊन जातात आणि गड चढताना गडावरच्या पक्ष्यांसारखा आवाजही काढतात. तो आवाज ऐकून पक्षी त्यांना प्रतिसादही देतात.

🌹

२) श्री जेधे नावाचा तरुण २७ जानेवारी आणि १६ ऑगस्टला एक गोणी घेऊन बाहेर पडतो आणि रस्त्यात पडलेले झेंडे, तिरंगी बिल्ले गोळा करतो. सायंकाळपर्यंत जमेल तितकं चालत जातो. शेवटी गोणी भरते. त्या गोणीला एक हार घालतो, नमस्कार करतो आणि ती डम्पिंग ग्राउंडवाल्यांच्या ताब्यात देऊन येतो. हे सगळं कशासाठी तर तिरंग्याचा अपमान होऊ नये म्हणून…!!! कचऱ्यातून आपलं अन्न काढतो असे समजून कुत्रे त्याच्यावर भुंकतात. तो हे काम करतो तेव्हा वेडा वाटतो. त्याला ह्यातून काही मिळत नाही, तरीही तो कर्तव्य समजून दोन दिवस काम करतो.

🌹

३) डोंबिवलीतही एक वेडे आजोबा आहेत.

रेल्वे रूळ ओलांडायला कितीही मनाई केली, दंड केला तरी घाईत असणारे प्रवासी रूळ ओलांडतातच. आजच्या जीवनशैलीमध्ये इतकी धावपळ आहे की प्रसंगी जीवावर उदार होऊन जगावे लागते. पण डोंबिवलीमध्ये एक आजोबा आहेत, ते काय करतात तर जिथून अनेक लोक रेल्वे रुळांवर शिरतात तिथे सकाळी आडवे उभे राहतात. दोन्ही हात लांब पसरवून ते रेल्वे रुळाकडे येणाऱ्यांना अडवतात. मधेच दोन्ही हात जोडून विनंती करतात की “रूळ ओलांडू नका, पुलावरून जा”. पण समोर लोकल लागली असल्यामुळे अनेकजण त्यांचे हात बाजूला करून रुळावरून धावत सुटतात. डोंबिवली हे तर मृत्यू समोर उभा असेल तरी धावणार शहर ! तिथे ह्या आजोबांचं कोण ऐकणार… ? तरीही आजोबा नेहमी येऊन उभे राहतात. त्यांना माहित आहे की आज हे रूळ ओलांडतील, पण तसे करणे धोकादायक होते, इतके तरी मनात येईलच. आज रूळ ओलांडले तरी उद्या घरातून लवकर निघतील आणि पुलावरून सुरक्षितपणे जातील.

🌹

 ४) मुंबईच्या लोकलमधून फिरणारा एक असाच “वेडा” सिंधी दिसतो.

दिसायला खरंच गबाळा आहे. पण काम फार मोलाचं करतो. ऐन उन्हाळ्यात जेव्हा सगळी लोकल तापते, जीव तहानेने व्याकुळ होतो तेव्हा हा सिंधी डब्यात चढतो. त्याच्या हातात दोन मोठ्या थैल्या असतात. थैली उघडतो आणि आपल्या चिरक्या आवाजात “जलसेवा” असे ओरडत तो डब्यामध्ये फिरू लागतो. त्यावेळी त्याने थंड पाणी आणले आहे हे पाहून प्रवासी सुखावतात. पाणी पिऊन तृप्त होतात. एकदा एकाने ह्या सिंध्याला बोलतं केलं होतं. त्याने सांगितलं,

“आम्ही सिंधी लोक तहानलेल्याला पाणी देणं ही झुलेलालची सेवा समजतो. ” आम्ही उल्हासनगरमध्ये खूप प्रॉडक्ट निर्माण केले. ते विकून पैसे कमावले. पण आम्ही कधी पाणी विकलं नाही. पण, अब वक्त बदल गया… , आता प्यायला मोफत पाणी मिळत नाही, खरीदना पडता है.

🌹

५) एका दैनिकात एका वाचकाने लिहिले होते की, मी आता ७२ वर्षांचा आहे. ह्या ७२ वर्षात मी एकदाही मातृभूमीवर थुंकलो नाही.. !!!

किती छोटी प्रतिज्ञा केली ह्या माणसाने. जमिनीवर न थुंकण्याची ! आज घडीला भारतातील प्रत्येक भाषेत एक वाक्य भाषांतरित झाले आहे आणि ते म्हणजे; थुंकू नका… !!! कोरोनाच्या पार्श्वभूमीवर थुंकणे जास्तच घातक बनले होते ! प्रत्येकाने वरील माणसासारखा “वेडा” विचार केला तर स्वच्छतेवर होणार प्रचंड खर्च वाचेल.

🌹

६) शर्मा नावाचा एक असाच वेडा आहे. तो कुठेही चारचौघात गप्पा मारताना ऍसिडिटी टाळण्याचे उपाय सांगतो – जेवल्यावर लगेच झोपू नका, अति तिखट खाऊ नका. जेलुसिल, रॅनटॅक घेण्यापेक्षा डाळिंबाचा रस किंवा कोकमाचा रस प्या, असे उपाय सुचवतो.

सतत मानसिक ताण असलेल्या व्यक्तीला हमखास ऍसिडिटी होते. म्हणून मानसिक ताण असणाऱ्यांनी कोणती योगासने करावीत हे भर रस्त्यावर करून दाखवतो.

म्हणून ह्या माणसाला “ऍसिडिटी मॅन” नाव पडलं आहे. कोणाची ओळख असो वा नसो हा माहिती सांगितल्याशिवाय राहत नाही. हे सगळं तो का करतो ? तो स्वतः एका मोठ्या कंपनीत केमिकल इंजिनिअर आहे. काही मित्रांना ऍसिडिटी होते हे पाहून ह्याने उपाय शोधले. त्यांना करायला लावले. त्यांचा त्रास कमी होताच ह्याने इतरांना सांगायला सुरुवात केली. रसायनशास्त्र शिकून पैसे मिळवून झाले, आता समाजासाठी ज्ञानाचा उपयोग करायचा असे त्याला वाटते. वरवर पाहता हा वेडेपणाच आहे. पण ज्याला सतत आम्लपित्ताचा त्रास होतो त्याला शर्मा हवाहवासा वाटतो.

🌹

७) असेच एक आहेत डॉ. भरत वटवानी. पती-पत्नी दोघेही सायकियाट्रिस्ट आहेत. एकदा त्यांना एक भिकारी दिसला. तो गटारीचं पाणी पीत होता. वटवानींनी त्याला आधी प्यायला शुद्ध पाणी दिलं. मग त्यांना कळलं की हा मुलगा गावातून शहरात आला असून इंजिनिअरिंगची पदवी मिळवली आहे. पण मानसिक संतुलन बिघडले आणि तो शहरभर भिकाऱ्यासारखा फिरू लागला. डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार करून त्याला त्याच्या घरी पाठवले. पुढे वटवानी पती-पत्नी रस्त्यावर दिसणाऱ्या अनेक मानसिक रुग्णांवर स्वतःच्या खर्चाने उपचार करत गेले. म्हणून त्यांना Ramon Magsaysay पुरस्काराने सन्मानितही करण्यात आले.

ह्या व्यवहारी जगात काही अशी माणसे दिसतात की त्यांनी चालवलेलं काम पाहून त्यांना वेड लागलं असावं असे वाटते. अशी ही बिघडलेली माणसे आहेत. आपल्याला समाज, मातृभूमी, आपला देश खूप काही देत असतो. कृतज्ञता म्हणून आपणही खारीचा वाटा द्यायला हवा हा विचार त्यामागे असतो. अशा वेड्या माणसांमुळेच जग सकारात्मक बनतं.

आपणही पृथ्वीतलावर आलो, भारतात जन्मलो. ह्या समाजाचे, मायभूमीचे पांग फेडण्यासाठी थोडा वेडेपणा करायला हवा.

ही अशी वेडी मंडळी पाहिली की शहाणी माणसे खुजी वाटू लागतात. त्यांचं काम समजून घेतल्यावर लक्षात येतं की, ते जे करतात ती माझीही जबाबदारी आहे.

🌹

एक अभंग आहे…. ;

“आम्ही बिघडलो, तुम्ही बिघडाना”

नीट वाचलं की समजतं;

आम्ही “बी घडलो, “

तुम्ही “बी घडाना….

🌹

माहिती संग्राहक : अज्ञात  

संग्रहिका: सौ.बिल्वा शुभम् अकोलकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “व्हॅलेंटाईन डे…” – लेखक : श्री सुधीर करंदीकर ☆ प्रस्तुती – श्री हेमन्त बावनकर ☆

श्री हेमन्त बावनकर 

? इंद्रधनुष्य ?

 “व्हॅलेंटाईन डे…– लेखक : श्री सुधीर करंदीकर ☆ प्रस्तुती – श्री हेमन्त बावनकर

“ १४ फेब्रुवारी म्हणजे व्हॅलेंटाईन डे” हे एक समीकरणच झालं आहे. सगळ्यांना हॅपी व्हॅलेंटाईन डे.“

काही वर्षांपूर्वी हा शब्द पण आपल्याला माहीत नव्हता आणि आता तरुणाईकरता, तो अगदी महत्वाचा सण किंवा उत्सुकतेने वाट बघण्याचा दिवस झाला आहे. काही जण असा पण विचार मांडतात, की, हा परदेशी सण आहे.  आपण का म्हणून साजरा करायचा ?

… आता हा सण किंवा दिवस, आपण साजरा करावा, की, नाही, याकरता हे माहिती करणे जरुरी आहे, की, व्हॅलेंटाईन चा काय अर्थ आहे, आणि  व्हॅलेंटाईन डे म्हणजे काय ? 

व्हॅलेंटाईन डे या उत्सवाचं मूळ ठिकाण, म्हणजे जन्मस्थान आहे, इटलीमधले रोम. व्हॅलेंटाईन हे माणसाचे नाव आहे, हे रोम मध्ये राहणारे एक पाद्री (प्रिस्ट) होते. त्यावेळेस तिथे क्लोडियस या सम्राटाचे राज्य होते. त्याला आपले साम्राज्य खूप वाढवायचे होते. त्याची अशी समज होती, की, सैन्यामधल्या लोकांनी जर लग्न केलं, तर ते मन लावून लढू शकत नाहीत. म्हणून सम्राटानी असा हुकूम काढला, की, सैनिकांना लग्न करण्याची परवानगी नाही. व्हॅलेंटाईन आणि कुणालाच हे पसंत नव्हते. पण – आलीया भोगासी. लोक लपून छपून  व्हॅलेंटाईनच्या मदतीने लग्न करायला लागले. राजापासून अशी गोष्ट किती दिवस लपून राहणार ! राजाला हे समजताच, व्हॅलेंटाईनला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आणि व्हॅलेंटाईनची रवानगी तुरुंगात झाली. 

रोमच्या लोकांचा असा समज आणि अनुभव होता, की, व्हॅलेंटाईनकडे दिव्य शक्ती आहे आणि त्यामुळे तो कुठलेही व्यंग / आजार दूर करू शकतो. तुरुंगाच्या जेलरची मुलगी जन्मापासून अंध होती. जेलरच्या विनंतीवरून व्हॅलेंटाईन नी आपल्या दिव्य शक्तींनी त्या मुलीला दृष्टी मिळवून दिली. मुलगी रोज व्हॅलेंटाईन ला भेटायला तुरुंगामध्ये यायला लागली, आणि दोघांमध्ये मैत्रीभाव निर्माण झाला आणि त्याचे पुढे प्रेमात रूपांतर झाले. फाशीचा दिवस उजाडला. व्हॅलेंटाईन नी जेलर कडून कागद आणि पेन मागून घेतला, आणि त्याच्या मुलीला चिठ्ठी लिहिली आणि खाली लिहिले – “तुझा व्हॅलेंटाईन”. हा दिवस होता १४ फेब्रुवारी ४९६. 

तेव्हापासून व्हॅलेंटाईन आणि त्या मुलीच्या प्रेमाची स्मृती म्हणून, जगभरातले प्रेमी – प्रेमिका हा दिवस वैलेंटाइन डे म्हणून साजरा करायला लागले. आपले प्रेम व्यक्त करण्याकरता फुलं, भेटवस्तू, ग्रीटिंग कार्ड आणि चॉकलेट एकमेकांना देण्याची प्रथा पण सुरु झाली. हळूहळू याची व्याप्ती वाढत गेली आणि नवरा- बायको, मित्र – मैत्रिणी, नातेवाईक, पाळीव प्राणी, असे सगळेच या परिघात आले. ज्याच्या विषयी आपल्या मनात प्रेमभावना आहे, त्यांना जगभरातले लोक, या दिवशी शुभेच्छा देतात आणि हा सण साजरा करतात. 

दोन तीन दशकांपूर्वी आपल्याकडे जागतिकीकरणाचे (ग्लोबलायझेशन) चे वातावरण तयार झाले आणि देश विदेशातील इतर गोष्टींबरोबर संस्कृतीची पण देवाणघेवाण सुरु झाली. आधी मंद गतीने सुरु झाली आणि आतातर झपाट्याने सुरु आहे. ‘व्हॅलेंटाईन डे’ हा याचाच भाग आहे, असे  म्हणता येईल. 

आपल्या देशाला सणांचा देश असे म्हटल्या जाते. इथल्या इतके सण इतर कुठेही साजरे होत नाहीत. दिवाळी, राखी, होळी, पोळा, ईद, ख्रिसमस, असे अनेक सण, उत्सव आपण आनंदानी, उत्साहानी आणि एकोप्याने साजरे करतो. आमचा – तुमचा असा भेदभाव, आपण भारतीय कधीच करत नाही. 

सगळ्या  सणांमागची कल्पना एकच असते, आणि ती म्हणजे, आपले प्रेम व्यक्त करणे. मग नवरा – बायको करता असो, प्रियकर – प्रेयसी करता असो, नातेसंबंधांकरता असो, मित्र परिवाराकरता असो, , प्राणिमात्रांकरता असो, किंवा निसर्गाकरता असो. मनापासून कुणावरही प्रेम व्यक्त केलं, तर आपलं मन प्रसन्न होतं, आनंदी होतं. 

पण आजच्या धकाधकीच्या जीवनात, आजच्या पळापळीच्या जीवनात, आपण सर्व जण, मनानी आणि शरीराने सारखे पळत आहोत. त्यामुळे वेळ आपल्या हातातून कायम निसटून जात आहे. आता आपल्याकडे म्हणजे कुणाकडे वेळच नाही, त्यामुळे कुणावरही मनापासून प्रेम तरी कधी करणार ! जीवनात प्रेम नाही, म्हणून आनंद नाही, आणि आनंद नाही म्हणून उत्साह नाही. या दुष्ट चक्रात आपण सगळेच अडकलो आहोत.  भविष्यकाळात हे सगळे असे घडणार आहे, हे ओळखून, आपल्या पूर्वजांनी निरनिराळ्या सणांची मुहूर्तमेढ रचली असावी. हेतू हाच, की, थोड्या थोड्या दिवसांनी असे सण येत जातील आणि त्या त्या दिवशी सगळे आनंदात राहतील. कुठलाही सण आला, की, आपण आधीपासून प्लॅनिंग करतो, वेळ काढतो आणि आपले प्रेम व्यक्त करत, सण आणि तो दिवस आनंदानी साजरा  करतो. 

असं म्हणतात – Love and happiness go hand in hand. The happiness you feel is in direct proportion with the love you give. 

… कुणाही बरोबर आपलं प्रेम व्यक्त करण्याकरता काळ / वेळ / आपली प्रथा / परदेशी प्रथा यांचं बंधन असण्याचं खरंतर काहीच कारण नाही. कारण —  

True love knows no reason 

आणि  

Love has no boundaries. 

सगळ्यांविषयी आपलं प्रेम व्यक्त करायला, आजचा व्हॅलेंटाईन डे हा पण एक छान दिवस आहे. 

पूर्वी सगळे नोकरदार  एक तारखेला खुश असायचे – 

“खुश है जमाना, आज पहिली तारीख है”.  

… आता सगळे प्रेम व्यक्त करणारे १४ फेब्रुवारीला पण खुश असतात – 

“ खुश है जमाना, आज  व्हॅलेंटाईन डे है”. 

♥ ♥ ♥ ♥ ♥

लेखक : श्री सुधीर करंदीकर 

मोबा 9225631100 इमेल <[email protected]>

प्रस्तुती : श्री हेमन्त बावनकर 

पुणे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “समर्थ शिष्या- संत वेण्णाबाई” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

? इंद्रधनुष्य ?

☆ “समर्थ शिष्या- संत वेण्णाबाई” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर

श्रीकृष्णासाठी विष पिणाऱ्या मीराबाई सर्वांना माहीत आहे पण रामरायासाठी विष पिणाऱ्या संत वेण्णाबाई माहित आहे का?

मृणालिनी जोशी यांचे १९८९ साली प्रसिद्ध झालेले दुर्मिळ पुस्तक ‘वेणास्वामी ‘ सज्जन गडावर मिळाले. ताईंनी पुस्तक इतके ओघवत्या भाषेत लिहिले आहे की तो काळ डोळ्यासमोर उभा राहतो. रसिक वाचकांनी अवश्य वाचावे. परतल्यावर या वेण्णाबाईंनी इतके झपाटून टाकले की शब्दब्रम्ह झरझर मोकळे झाले.

सुमारे पाचशे वर्षांपूर्वी समर्थांचा परीस स्पर्श झालेली ही बालविधवा सौदामिनी सारखी चमकून लुप्त झाली. कोल्हापूरच्या गोपाजीपंत देशपांडे कुटुंबात जन्मलेली ही निरागस कन्या मिरजेच्या जनार्दनपंत देशपांडे कुटुंबाची स्नुषा झाली. अत्यंत देखणे सात्विक रूप आणि कुशाग्र बुद्धी यांचा मिलाफ म्हणजे वेणूबाई. दुर्दैवाने अवघ्या दोनच महिन्यात त्यांच्या पतीचा अपघाती मृत्यू झाला. वयाच्या अकराव्या वर्षी त्या कोवळ्या जिवावर जणू आकाशच कोसळले. प्रथेप्रमाणे सुंदर लांबलचक रेशमी केशसंभार कापला गेला आणि लाल अलवणात ( विधवेसाठी असलेले एक खास वस्त्र) त्यांचा सुकुमार देह गुंडाळला गेला. एका निरागस कळीच्या पाकळ्या पाकळ्या पडून जणू फक्त देह रुपी विद्रूप देठ शिल्लक राहिला. आता तो देह फक्त राबण्यासाठी उपयुक्त होता. वेणूच्या पिताश्रीनी त्यांना बालपणीच काळाच्या पुढे जाऊन अक्षर ओळख करून दिली होती. अनेक ग्रंथांचा अभ्यास त्यांच्या कडून करून घेतला म्हणून त्यांचे जीवन थोडे तरी सुसह्य झाले. वैधव्य आले तरी त्यांचे मन धर्मग्रंथांकडे ओढ घेई आणि त्यात रमून जाई. सक्तीचे ब्रह्मचर्य अनुभवताना हळू हळू मन अंतर्मुख झाले आणि आत अनेक प्रश्न तरंग निर्माण होऊ लागले. देवाने आपल्याला मनुष्य जन्म दिला, ज्ञान साधनेची वाट दाखवली. आपण ज्ञानाचा उपयोग केला नाही तर आपला जन्म व्यर्थ जाईल असे वाटू लागले. आपल्या आत्मारामाची ओळख कोण करून देईल? अशी त्यांच्या जीवाला गुरू भेटीची आस लागून राहिली.

ती तळमळ स्वामी समर्थांना त्यांच्याकडे घेऊन गेली. ‘जय जय रघुवीर समर्थ ‘ अशी आरोळी अंगणात घुमली आणि वेणूबाईंचा आत्मा गुरू दर्शनासाठी तळमळत होता ते गुरू विधिलिखित असल्या सारखे त्यांच्या दारी उभे राहिले. वेणूबाईंचे देह भान हरपले…. आत्मा गुरूचरणी समर्पित झाला. स्वामींच्या कीर्तनात त्या रंगून गेल्या. काळ वेळेचे देखील भान हरपले. अंबाबाईच्या देवळात रात्री कीर्तनाला गेलेल्या वेणू बाई पहाटेची काकड आरती करून परतल्या. माहेरच्या प्रेमाच्या माणसांना देखील विधवा मुलीने केलेला हा प्रमाद सहन झाला नाही. धर्म रक्षण करणाऱ्या नातेवाईक लोकांनी अनेक आरोप प्रत्यारोप करून त्या अश्राप बालिकेचा जीव हैराण करून सोडला. समर्थां सारखा लफंगा संन्यासी तुला काय मोक्ष देणार म्हणून त्यांना हिणवले. विजेचा कडकडाट व्हावा तसे वेणू बाईंनी सगळ्यांचा समाचार घेतला. उद्वेगाने ‘मी काया वाचा आणि मनाने पवित्र आहे कोणती कसोटी लावता?’ असे विचारले. आप्त स्वकीयांनी विष प्राशन करण्याची शिक्षा ठोठावली. मिरेप्रमाणेच रामराया पुढे ठेवलेले विष त्यांनी हसत हसत प्राशन केले. जहाल विषाने रात्रभर तडफड करणारा सुकुमार देह अरुणोदय होताच शांत झाला. माता पिता आक्रोश करू लागले. लोक अंतिम तयारीला लागले. त्याच वेळी अंगणात ‘जय रघुवीर समर्थ ‘ ही गर्जना घुमली. समर्थांनी ‘वेणू बाळा उठ ‘ असे म्हणताच हळु हळू त्या अचेतन शरीरात प्राण परत आले. दूषणे देणारे सगळेच चकित झाले. आता या वेणू बाई आमच्या बरोबर येतील.. कारण आता त्या तुमच्या नाहीत तर फक्त रामरायाच्या आहेत असे समर्थांनी निक्षून सांगितले. मागे वळूनही न पाहता सारे माया पाश तोडून ही योगिनी समर्थ गुरूच्या पावलावर पाऊल टाकून घरा बाहेर पडली. त्या काळात त्यांनी हे धैर्य दाखवले.

चाफळच्या मठात अनेक विधवा तसेच परित्यक्ता अनाथ स्त्रिया मठातील सगळ्या शिष्यांना रांधून घालायचे काम करत होत्या. समर्थ देखील इतके पुरोगामी होते की रामरायाला या अबलानी केलेला नैवेद्य अर्पण करत असत. समर्थांनी प्रत्येक स्त्रीचा पिंड आणि आवड पाहून त्यांना वेगवेगळी उपासना सांगितली. काहिंना फक्त नामस्मरण करा असे सांगितले.

विष प्राशन केल्यामुळे वेणुबाईंची प्रकृती नाजूक बनली होती. त्यांचा वर्ण देखील काळवंडला होता. वेणूबाई अत्यंत तैल बुद्धीच्या, गोड गळ्याच्या आणि अशक्त प्रकृतीच्या असल्याने समर्थांनी त्यांना ग्रंथ वाचन, पाठांतर करायला लावले इतकेच काय गुरू नेमून गायन देखील शिकायला लावले. एक दिवस या वेणू बाईंना त्यांनी चक्क कीर्तनाला उभे केले. भारत देशातल्या पहिल्या विधवा कीर्तनकार म्हणून त्यांचे नाव सुवर्ण अक्षरात कोरले गेले. त्यांची रसाळ तेजस्वी वाणी पाहून अनेक पंडित, शास्त्री, कीर्तनकार थक्क झाले.

समर्थांनी त्यांना सर्व प्रकारे उत्तम शिक्षण दिले आणि घडवले. कुटुंबाला नकोशा झालेल्या असंख्य स्त्रियांना समर्थांनी आपल्या विविध रामदासी मठात मानाचा आसरा दिला. वेणू बाई परत माहेरी किंवा सासरी गेल्या नाहीत. सासूबाई निवर्तल्या आणि त्यांचा सासरचा वाडा मोकळा पडला.

समर्थांनी वेणू बाईंना त्यांच्या सासरच्या वाड्यात मिरजेला रामदासी मठ स्थापन करून सन्मानाने मठाधिपती करून टाकले. ती जबाबदारी त्यांनी समर्थपणे पेलली. समर्थांची आणि रामरायाची आज्ञा घेऊन वयाच्या पन्नाशीत या दिव्य स्त्रीने अखेरचे कीर्तन सादर केले आणि स्वेच्छेने सज्जन गडावर देह ठेवला.

त्यांच्या समाधीवर लावलेले चाफ्याचे झाड नंतर बहरले. समर्थांनी देह ठेवल्यावर ते झाड मूकपणे गुरूंच्या समाधीवर फुले वाहू लागले! गुरू शिष्य नाते रामरायाच्या चरणी विलीन झाले…. द्वैत सरले. धन्य ते काळाच्या पुढे असलेले गुरू आणि ती जगा वेगळी शिष्या 🙏

जय जय रघुवीर समर्थ🙏

लेखक : अज्ञात 

संग्राहक : श्री मोहन निमोणकर

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “मिले सूर मेरा तुम्हारा…sss… अजरामर गाण्याची अद्भुत कहाणी” – लेखक :  डॉ. धनंजय देशपांडे ☆ प्रस्तुती : सुश्री सुलभा तेरणीकर ☆

सुश्री सुलभा तेरणीकर

? इंद्रधनुष्य 

भारतरत्न पं. भीमसेन जोशी

☆ “मिले सूर मेरा तुम्हारा…sss… अजरामर गाण्याची अद्भुत कहाणी” – लेखक :  डॉ. धनंजय देशपांडे ☆ प्रस्तुती : सुश्री सुलभा तेरणीकर ☆

मिले सूर मेरा तुम्हारा ssssss हे गाणे माहित नाही असा एकही भारतीय नसेल. इतकं हे गाणं सगळ्यांच्या हृदयात वसलेलं आहे. हे गाणे जितके श्रवणीय तितकीच त्याच्या निर्मितीची कहाणी देखील अद्भुत आहे.

झालं असं की, पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या मनात एक विचार आला की, तरुणांना विशेषतः लहान मुलांना प्रेरित करणारे आणि एकतेचा संदेश देणारे एखादं गाणे तयार करून ते दूरदर्शनवरून सर्वत्र पोचवावे. ज्यातून “मेरा भारत महान” हि संकल्पना तर सर्वत्र जाईलच शिवाय प्रत्येकाला यात आपला प्रांत सामावून घेईल. त्यांच्या इच्छेनुसार मग एक प्रस्ताव तयार करण्यात आला. आणि भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांच्याकडे हे गाणे कंपोज करण्यासाठी आले.

*

संपूर्ण फिल्म इंडस्ट्री एकत्र :

या एकूणच गाण्याची व ते कसे कसे आणि कुठे कुठं शूट करायचे, यात कुणाकुणाला घ्यायचे इत्यादींची संकल्पना सुरेश मलिक आणि प्रसिद्ध ऍड फिल्ममेकर कैलाश सुरेंद्रनाथ यांची आहे. विशेषतः यातील सिनेकलाकार यांच्या तारखा मिळवताना त्रास होईल असा या जोडगोळीचा अंदाज होता मात्र एकूण एक कलाकारांनी अगदी हव्या त्या तारखा यांना दिल्या त्यामुळे जवळपास पूर्ण फिल्म इंडस्ट्री यात दिसते.

*

विश्वविक्रमी गाणे :

15 ऑगस्ट 1988 रोजी दूरदर्शनवरून हे गाणे प्रथमच रिलीज करण्यात आले. याचे संगीतकार पं. भीमसेन जोशी, भैरवी रागातील या गाण्याचे गीतकार होते प्रसिद्ध कवी पियुष पांडे. भारतातील प्रमुख अशा चौदा भाषेत प्रथमच असं हे गाणं तयार झालं असून तोही एक विश्वविक्रम आहे. हिंदी, काश्मीरी, पंजाबी, सिंधी, उर्दू, तामिळ, कन्नड, तेलगू, मल्याळम, बांगला, आसामी, उडिया, गुजराती आणि मराठी भाषेत दोन दोन ओळी रचल्या गेल्यात.

*

लतादीदीची एन्ट्री :

खरेतर सुरुवातीला यातील गायिकेच्या आवाजातील सर्व ओळी भारतरत्न लता मंगेशकर गाणार असं ठरलं होत. मात्र जेव्हा गाणे रेकॉर्डिंग करण्यासाठी स्टुडिओ बुक करण्यात आला, तेव्हा नेमक्या लतादीदी परदेशात होत्या. त्यामुळे मग कविता कृष्णमूर्ती यांच्या आवाजात ते गाणे सुरुवातीला रेकॉर्ड करण्यात आले. मात्र गाणे रिलीज होण्याच्या दोन दिवस आधी लता दीदी भारतात परतल्या. त्यांना हे गाणे रेकॉर्ड झाल्याचे कळले. त्यांनी स्टुडिओत जाऊन ते गाणे ऐकले आणि म्हणाल्या, “पंडितजी…. मला हि संधी सोडायची नाहीय. काहीतरी जुळवून आणा. मी आजच रेकॉर्डिंगसाठी वेळ देते”

आता पंचाईत झाली. कारण त्यामुळे कविताजीचे नाव आणि गायन वगळून तिथं दीदीचे बसवायचे…. कविताजी नाराज झाल्या खऱ्या पण मन मोठं करून त्यांनी यासाठी आनंदाने होकार दिला याबद्दल दीदी इतक्या ज्येष्ठ असूनही त्यांनी कविताजी यांचे आभार मानले. आणि मग लता दीदी तिरंगी ध्वज रंगाचा पदर असलेली पांढरी साडी परिधान करून स्टुडिओत आल्या आणि त्यांच्या स्वरात हे गाणे रेकॉर्ड झाले. मात्र परस्पर सामंजस्याने नंतर असं ठरलं की कविताजी यांनीही मेहनत घेतलेली आहे तर किमान एक दोन ओळी त्यांच्या पण असूद्यात ! त्याप्रमाणे मग गाण्यात शबाना आझमीच्या तोंडी असलेल्या ओळी या कविता यांच्या आहेत तशाच ठेवण्यात आल्याचे सांगितले जाते.

*

प्रसिद्ध धबधबा :

या गाण्यात सुरुवातीला पं. भीमसेनजी ज्या धबधब्याजवळ उभे राहून गाणे गाताना दिसतात तो कोडईकनाल पम्बर फॉल्स आहे ! हाच तो धबधबा आहे जिथं लिरिल साबणाची त्या काळात सुपर हिट झालेली जाहिरात शूट करण्यात आली होती. त्यामुळे त्याला नंतर “लिरिल फॉल्स” असेच नाव पडले !

*

ताजमहाल शूटिंग किस्सा :

या गाण्यातील एका कडव्यात ताजमहाल दिसतोय जो एरियल व्ह्यू स्टाईलने शूट करण्यात आला आहे. खरेतर वर्ल्ड हेरिटेज जाहीर झालेल्या वास्तूच्या भोवती असं एरियल शूट करण्याची परवानगी नसते. मात्र कैलाशजी याना तसेच शूट हवे होते मग प्रॉडक्शन टीमसह भीमेसनजी यांनी थेट एयर मार्शल यांची भेट घेऊन इच्छा सांगितली. शिवाय हा प्रोजेक्ट खुद्द पंतप्रधान यांच्या मनातला आहे हेही सांगितलं आणि त्यानंतर परमिशन मिळाली. इतकंच नव्हे तर भारतीय सेनेच्या हेलिकॉप्टरमधून ते एरियल व्ह्यू शूट घेण्यात आलं.

*

गाण्यातील एका कडव्यात पाण्यात हत्ती खेळताना दिसतात, ते शूटिंग केरळ येथील पेरियार नॅशनल पार्कमधील असून हत्तीही तिथलेच आहेत. यासाठीही वन विभागाने तातडीने हालचाल करून सर्व त्या परवानग्या दिल्या. नाहीतर अशा रिजर्व पार्क मध्ये शूटिंगला परवानगी नसते.

*

दोन महत्वाच्या रेल्वे :

या गाण्यात दोन ठिकाणी दोन वेगवेगळ्या रेल्वे दिसतात. त्या दोन्ही पूर्ण देशभरात प्रसिद्ध अशा रेल्वे आहेत. पहिली आहे ती कलकत्याची मेट्रो रेल्वे आणि दुसरी आहे आपल्या महाराष्ट्राची शान असलेली डेक्कन क्वीन ! तनुजा जेव्हा मराठी ओळी गाताना दिसतात त्यावेळी हि रेल्वे येते !

आहे न अभिमानाची गोष्ट !

*

कोरस मंडळींचा मोठेपणा :

या गाण्यात सर्वात शेवटी भारताच्या नकाशाच्या आकारात अनेक माणसे उभी असलेली दिसतात न ते सगळं शूटिंग मुंबईच्या फिल्मसिटीत करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे फिल्म इंडस्ट्रीमध्ये अशा कोरस शॉटसाठी माणसे पुरवणारी एजंसी असते त्यांनी नेहमीप्रमाणे पैसे ठरवून माणसे बोलावली. शूटिंग झालं आणि शूट झाल्यावर लोकांना कळलं की ते किती मोठ्या प्रोजेक्ट मध्ये सहभागी आहेत आणि देशासाठीचे हे गीत आहे म्हटल्यावर त्यातल्या एकानेही एक रुपयाही मानधन घेतलं नाही. तसेच यातील एका ओळीत शाळेतील लहान मुले तिरंगी गणवेशात एकत्र धावत येतात त्याचे शूटिंग उटी येथील बोर्डिंग स्कुल मध्ये झाले आहे.

*

स्वतःचे कपडे वापरणारे कलाकार :

गाण्यात एका सीनमध्ये अमिताभ, जितेंद्र आणि मिथुन चक्रवर्ती आहेत. या तिघांचे शूटिंग भल्या सकाळी एका बंगल्याच्या खाजगी बागेत करण्यात आले. आणि अवघ्या दहा मिनिटात तो सिन वन टेक शूट झाला. विशेष म्हणजे यात त्यांच्या अंगावर जे कपडे आहेत ते त्यांचे त्यांचे स्वतःचे आहेत. अन्यथा इतरवेळी शुटिंगवाल्याकडून कपडे पुरवले जातात. ज्याला बऱ्यापैकी खर्च येतो मात्र या तिघांनी त्याला नम्र नकार देऊन स्वतःचे कपडे आणले होते.

*

कमल हसन यांची ऐनवेळी एंट्री

दाक्षिणात्य प्रसिद्ध गायक एम. बालमुरलीकृष्ण यांचे या गाण्यातील दोन ओळीचे रेकॉर्डिंग होते. त्यावेळी स्टुडिओत अचानक कमल हसन आले. ते कसे काय आले इथं ? असं विचारण्यात आले तेव्हा ते म्हणाले की, “माझे गुरु आहेत बालमुरलीकृष्ण…. त्यामुळे त्यांचे गाणे रेकॉर्ड होताना पाहावे म्हणून आलोय”

यावर कैलाशजी म्हणाले की, ” संध्याकाळी या ओळीचे शूटिंग आहे समुद्र किनारी तर वेळ असेल तर या की तिथेही “

आणि कमल हसन तिथं नंतर पोचले आणि चक्क त्यांनाच शूटिंग मध्ये सहभागी करून घेण्यात आले आणि अशारितीने ऐनवेळी त्यांची एंट्री यात झाली.

*

जगाच्या पाठीवर प्रथमच असे काहीतरी :

एकतेचा संदेश देणाऱ्या या गाण्यात जवळपास सर्वच क्षेत्रातील दिग्गज मंडळी दिसतात. जगाच्या पाठीवर प्रथमच एका गाण्यासाठी हे घडलं आहे. फिल्म लाईन, क्रीडा, गायक, वादक, चित्रकार, कार्टूनिस्ट, फिल्म निर्माता, आर्किटेक्ट, टेलिव्हिजन होस्ट असं सगळं सुंदर मिश्रण यात जुळून आले आहे. एखादं गाणं इतकं अजरामर का होतं…. त्या मागे किती काय काय घडत असत अन किती जणांचे कष्ट असतात हे आपल्यापैकी अनेकांना माहित नसतं. ते माहित असावं म्हणून हा पोस्ट प्रपंच !

थोडक्यात सांगायचं तर… 

… असं गाणं पुन्हा होणे नाही !!!

*

लेखक :  डॉ. धनंजय देशपांडे 

प्रस्तुती : सुलभा तेरणीकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ योजकस्तत्र दुर्लभ:! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

 

? इंद्रधनुष्य ?

योजकस्तत्र दुर्लभ:! ☆ श्री संभाजी बबन गायके 

कै. संतोष नरहर काळे

योजकस्तत्र दुर्लभ:! 

अयोग्य: पुरुषो नास्ति योजकस्तत्र दुर्लभ:! 

अर्थात कोणतीही व्यक्ती (पूर्णांशाने) अयोग्य नसतेच. फक्त त्या व्यक्तीचा योग्य त्या कार्यात उपयोग करणारे दुर्लभ असतात. हे आठवायचं कारण म्हणजे अशा एका योजक व्यक्तीचं तसं अकाली निघून जाणं होय. कदाचित या योजकाची जगाच्या योजकाला आवश्यकता काहीशी तातडीने भासली असावी. अन्यथा धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक आणि सेवा कार्यात अग्रेसर राहून अगणित लोकांच्या मनात आदराची भावना निर्माण करीत पूजनीय स्थान प्राप्त करण्याच्या मार्गावर खूप पुढे गेलेल्या माणसाचं, अर्थात संतोष नरहर काळे गुरुजी यांचे वयाच्या पासष्टीमध्ये निधन होणं मनाला पटणारं नाही. त्याचं जाणं अकाली म्हणता येत नसलं तरी अशा माणसाची समाजाला आणखी गरज होती, हे मात्र त्या दिवशी अंत्यसंस्काराला उपस्थित असलेला विविध क्षेत्रांमधील समुदाय पाहून दिसले. असो.

पुण्याच्या जवळच्या निगडीच्या काहीशा ओबडधोबड माळरानामध्ये प्राधिकरण नावाची एक सुनियोजित वस्ती उभारण्यात आली. नियोजनानुसार ही वस्ती चहूबाजूंनी फुलली सुद्धा. येथे समान शील… सख्यम न्यायाने एकसमान विचारधारेची माणसं एकत्रित येणंही साहजिकच आणि त्यांच्या नेतृत्वाची गरजही तितकीच नैसर्गिक.

नेमक्या याच पोकळीत बी. एस्सी. पदवी प्राप्त एक तरुण, अक्षरश: हरहुन्नरी कार्यकर्ता येऊन स्थिरावला आणि त्याने माणसं जमवायला सुरुवात केली. नोकरी हा त्याच्या पत्रिकेत अजिबात नसलेला ग्रह. त्यामुळे नोकरीच्या फंदात सहसा न पडता त्याने आपला बराचसा वेळ ज्योतिषाचा अभ्यास, गड-किल्ल्यांचा अभ्यास, पोवाडे गायन, इतिहास संशोधन आणि या क्षेत्रातील दिग्गज मंडळींच्या सहवासात आणि चौफेर भ्रमंती यात व्यतीत करायला आरंभ केला आणि हाच क्रम शेवटपर्यंत राहिला. नाही म्हणायला दहावीपर्यंतचे गणित-शास्राच्या शिकवण्या घेणे, किल्ल्यांची स्वत: काढलेली छायाचित्रे ग्रीटींग कार्ड स्वरुपात छापून त्यांची विक्री करणे, वैशिष्ट्यपूर्ण दैनंदिनी छापून घेणे, मसाला-लोणची घाऊक विक्री अशा अनेक उद्योगांतून त्याने पैसे वगळता अनेक गोष्टी कमावल्या! यातील अनेक उद्योग तर त्याने संपर्कातील तरुणांना चांगल्या अर्थाने ‘चांगलेच कामाला’ लावण्यासाठीच केले असावेत! 

पण यातील शिकवणी घेणे या एका गृहोद्योगातून त्याच्या प्रभावक्षेत्रात कित्येक युवक युवती आले. मग हीच लहान मोठी मुले-मुली त्याच्यासोबत किल्यावर बागडताना दिसू लागली. काहीजण त्याच्या सोबत पोवाड्यात साथ करायला जाऊ लागली. हे कार्य करता करता अनेक मुलांच्यात असलेला कार्यकर्ता तो विकसित करूही शकला.

छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या बलिदान स्थळी मुक्कामी राहून तेथे त्यांचा पोवाडा सादर करण्याची कल्पनाही त्याचीच. त्या कार्यक्रमासाठी साठी दरवेळी नवनवीन मुलांना तेथे घेऊन जाणे याकडे त्याचा कटाक्ष असे.

आपल्या भाग्यात काय लिहिले आहे किंबहुना आपल्या भाग्यरेषा आपल्या जीवनाला कुठे घेऊन जाताहेत, हे समजून घेण्याची सामान्यजणांची ओढ आणि निकड त्याने खूप आधी ओळखली होती. पत्रिका दाखवायला आलेल्या माणसांच्या पत्रिकेत समाजसेवेचा अगदी सामान्यातला सामान्य ग्रह जरी याला दिसला… की त्या माणसाच्या सामाजिक पत्रिकेतील भाग्यस्थानी एखादा तरी चांगला कर्मग्रह अलगद येऊन बसायचा. व्यक्तीची एकूण सर्वसाधारण मनोवृत्ती लक्षात घेऊन, त्या व्यक्तीला बिलकुल घाबरवून न ठेवता त्याचे भविष्य तो अचूक वर्तवायाचा. त्यामुळे त्याच्या घरी विद्यार्थ्यांचा, पालकांचा, राजकीय, सामाजिक कार्यकर्त्यांचा सतत राबता असायचा. जोडीला अनेक व्याधींवरील देशी उपचार ज्ञात असलेल्या या माणसाकडे औषधीविषयक सल्लाही उत्तम मिळायचा! 

निगडी प्राधिकरणात महामार्ग ते रेल्वे रूळ असा श्री संत ज्ञानेश्वर महाराज चौक असा एक भाळा मोठा, रुंद रस्ता आहे. या रस्त्याच्या मध्यभागी दुभाजक आहेत. या दुभाजकाच्या मधल्या जागेत कचरा टाकावा असे कुणाला कधी सांगावे लागले नाही. ही समस्या लक्षात घेऊन आपल्या या लेख नायकाने या जागेत शोभेची झाडे, वनस्पती लावाव्यात अशी कल्पना मांडली. ज्यांनी या कल्पनेला अनुमोदन दिले ते लोक ही बाब काही गांभीर्याने घेत बसले नाहीत. पण या महाशयांनी मात्र संबंधित प्रशासनाकडे पाठपुरावा करीत राहून ते काम सुरु होईल असे पाहिले. आणि आरंभी स्वत: त्या कामाचा ठेका घेतला… अर्थात केवळ ठेका. अर्थप्राप्ती आणि हा माणूस यांत आधीपासून होता तो दुभाजक कायमच राहिला. आज हा दोन तीन किलोमीटर्सचा रस्ता वाहतुकीतला एक प्रेक्षणीय भाग आहे.

हा माणूस बहुदा जन्मत:च ज्येष्ठ वगैरे असावा. कारण तो तरुण कधी दिसलाच नाही, पण कायम तरुणांमध्ये दिसला, लहान मुलांमध्ये दिसला. पोरांना किल्ले दाखवायचे आणि मग ते दिवाळीत करायला लावायचे त्याला जमायचे. लहान मुलांचा काका व्हायला तर त्याने अजिबात वेळ लावला नाही. इतरांसाठी दादा तर तो होताच पण त्याच्यापेक्षा वयाने बरीच लहान पोरं त्याला एकेरीत सुद्धा हाक मारू शकायची, यातच त्यांचं सामाजिक यश सामावलेलं होतं.

डोळ्यांवर जाड भिंगाचा चष्मा. त्यातून दिसणारे चमकदार डोळे. आणि त्या डोळ्यांतून त्याचं ते माणसांकडे पाहणे… एकदम स्पष्ट असे. बोलता बोलता उजवा हात नाकावरून घासत थेट कपाळापर्यंत नेणे, ही लकब. आणि हसणं अगदी खळखळून. सर्व वयाच्या लोकांसाठी त्याच्याकडे स्वतंत्र किस्से आणि विनोद होते.

त्याचे बाबा सुद्धा अगदी लहान मुलांची इंग्लिशची शिकवणी घेत असत. त्यामुळे हे लहानगेच पुढे बढती मिळून याचे विद्यार्थी बनत.

ज्योतिषाचा पसारा वाढत गेल्यावर हे मग गुरुजी म्हणून जास्त ओळखले जाऊ लागले. पत्रिका दाखवायला येणारा माणूस सुरुवातीला क्लाएन्ट असायचा आणि थोड्याच वेळात त्याचे स्नेह्यात रुपांतर व्हायचे.

एक अफाट उपक्रम काळे गुरुजींनी हाती आणि डोक्यात घेतला होता. आणि तो म्हणजे वेदअध्ययन आणि अध्यापन. त्यासाठी या आधुनिक काळात किती साधना करावी लागत असेल याची कल्पना आपल्यासारख्या सामान्य लोकांना येणार नाही.

पुण्याजवळच्या ग्रामीण भागात त्यांनी एक रीतसर आश्रमसुद्धा उभारला होता. यासाठीची आर्थिक तरतूद ही केवळ त्यांचे समाजाशी असलेले आणि जोपासलेले वैय्यक्तिक संबंध आणि प्रामाणिक हेतू यांमुळेच होत असावी. अन्यथा अर्थप्राप्तीचा कुठलाही मोठा स्रोत नसताना अशी मोठी कामे उभी राहणे, केवळ अशक्य. आणि एवढं सगळं होत असताना संसारिक माणूस सुख-दुखा:चे, वैद्यकीय समस्यांचे प्रसंग जे अपरिहार्यपणे भोगतो… ते त्यांनाही चुकले नाहीत. पण एक मोठा माणूस होण्याच्या त्यांच्या अखंड प्रवासात हे भोग त्यांनी शांतपणे पचवले! त्यांच्या निधनाची वार्ता कानी येताच त्यांच्या घराकडे लागलेली रीघ पाहून सौर्हादाची श्रीमंती कमावलेला मनुष्य समाजाने गमावला आहे, ही जाणीव गडद होत होती!

पण गेली काही वर्षे ते त्यांच्या संपर्कात येणा-या प्रत्येकाला एक स्वप्नवत योजना सांगत असतच… भव्य चौसष्ठ योगिनी मंदिर! या मंदिराची सर्व योजना, आराखडा, रेखाटने त्यांच्या खिशात कायम असत. या कामासाठी त्यांनी अनेक माणसं योजून ठेवली होती. ही भव्य योजना ऐकून ही योजना यशस्वी होईल किंवा कशी होईल, अशी काळजी ऐकणा-याच्या चेहर-यावर दिसू लागली की काळे त्याच्याकडे पाहून फक्त गूढ हसत… जणू म्हणत…. बरंचसं काम झालंय रे… तू फक्त तुझा वाटा उचल! आणि खरोखरच मागील काही दिवसांत चौसष्ठ योगिनीच्या मूर्ती तयार झाल्याही होत्या. आता योजनेचा पुढील अध्याय सुरु व्हायचा होता… पण संतोष काळे गुरुजींच्या श्वासांचा अध्याय समाप्त झाला !

असे योजक दुर्लभ असतात हे खरे ! 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ हे आपल्याला माहीत आहे का ? ☆ सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

? इंद्रधनुष्य ?

हे आपल्याला माहीत आहे का ? ☆ सुश्री प्रभा हर्षे  ☆

हे आपल्याला माहीत आहे का ?

डेक्कन क्विन express कल्याणला का थांबत नाहीं?

कल्याण ! मध्य रेल्वेवरील एक अतिशय महत्वाचे जंक्शन ! मुंबईला उत्तर आणि दक्षिण भारताला जोडणारे एक महत्वाचे स्थानक ! कोणतीही लांब पल्ल्याची गाडी सामान्यपणे कल्याणला थांबतेच थांबते ! पण कल्याणला एक गाडी अजिबात थांबत नाही, ती म्हणजे ‘ दक्षिणेची राणी ‘ ‘ डेक्कन क्वीन ‘ ! मुंबईहून पुण्याला धावणारी ही गाडी कल्याणला थांबत नाही ह्याचे नवल वाटतेय ना ! बरोबर !!

त्याचे कारण असे आहे की कल्याण नगरपालिकेच्या हद्दीतून रेल्वे धावत होती ह्याबद्दल रेल्वे काही कर कल्याण नगरपालिकेला देऊ लागत असे. पण पुढे काही वर्षे रेल्वेने तो कर नगरपालिकेला दिला नाही. त्यामुळे संतापलेल्या कल्याण नगरपालिकेने रेल्वेला कोर्टात खेचले. कोर्टाने कल्याण नगरपालिकेच्या बाजूने निकाल दिला आणि कल्याण नगरपालिकेने डेक्कन क्वीन ह्या गाडीचे इंजिन जप्त केले. रेल्वेचे अधिकारी दुसऱ्या दिवशी आले, त्यांनी तो कर भरला आणि मग कल्याण नगरपालिकेने ते जप्त करून एक रात्र स्वतःच्या ताब्यात ठेवलेले डेक्कन क्वीनचे इंजिन रेल्वेला परत केले.

आपला हा अपमान आणि नामुष्की रेल्वे विसरली नाही आणि तिने कल्याणला डेक्कन क्वीन ही गाडी कधीच न थांबवण्याचा निर्णय घेतला ! 

ह्या खटल्यात कल्याण नगरपालिकेची बाजू समर्थपणे मांडणारे वकील होते डॉ बाबासाहेब आंबेडकर !!

माहिती संकलक : अज्ञात 

प्रस्तुती : सुश्री प्रभा हर्षे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “आजची दुर्गा वैष्णवी अशोक खरे ”… माहिती संकलक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ “आजची दुर्गा वैष्णवी अशोक खरे ”… माहिती संकलक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर

आजची दुर्गा – वैष्णवी अशोक खरे

. . . कम से कम एक साल देश के नाम

– इयत्ता तिसरी पर्यंत साताऱ्यात शिकलेली. चवथीत पुण्यात आल्यावर स्कॉलरशिप मिळवणारी

– दहावी बारावी अव्वल मार्क(96 %) मिळवून मेरिटवर Cummins college मध्ये कॉम्प्युटर सायन्स ला एडमिशन मिळवणारी.

– त्याचवेळेला समिती, कीर्तन, मल्लखांब शिकणारी 

– मल्लखांब मध्ये राष्ट्रीय सुवर्णपदक मिळवणारी

इथेच ओळख संपत नाही

– आईबाबांची एकुलती एक लाडकी, कॅम्पस प्लेसमेंट मध्येच दहा लाखाची(सात आकडी) नोकरी मिळवणारी. दोन वर्षात पॅकेज सोळा लाख मिळवणारी

– आता प्रमोशन झाले तर वीस लाखाच्या पुढे जाऊ शकणारी,

– पण

मोहात पडण्याची शक्यता पण नको म्हणून लगेच नोकरी सोडून देव, देश, धर्म यांच्या कामासाठी समितीची प्रचारिका म्हणून बाहेर पडणारी, महाराष्ट्र, पंजाब राज्यात समिती सांगेल ते खडतर काम करणारी.

– कम से कम एक साल देश के नाम हे प्रत्यक्ष आचरणारी 

– देशाच्या तरुण पिढीतील आश्वासक दुर्गा. . . .

या वैष्णवीचा जन्म सातारचा. लहानपणापासून वैष्णवीला वडिलांकडून संघ विचारांचे संस्कार मिळाले. तिचे वडील संघाचे कार्यकर्ते तर आई समितीची कार्यकर्ती. वैष्णवीची सातवीत समितीच्या शाखेशी ओळख झाली, तेंव्हापासून समिती हा वैष्णवीच्या आयुष्याचा अविभाज्य घटक बनला. लहानपणी वैष्णवी बाबांचे संघ काम बघत होती, घरी येणारे संघाचे पूर्णवेळ कार्यकर्ते, त्यांचे समर्पण, त्यांचे विचार बघत ती मोठी झाली. चांगले लौकिक शिक्षण घेऊन खोऱ्याने पैसे कमवायचे सोडून लोक पूर्ण वेळ संघाचे काम करतात हे तिच्या मनावर कोरले गेले. त्याचाच परिणाम स्वरूप आज गलेलठ्ठ पगाराची नोकरी सहजपणे सोडून ती पूर्णवेळ विस्तारिका म्हणून बाहेर पडली.

सहा वेळा राष्ट्रीय स्तरावर मल्लखांब खेळात सहभागी झालेली वैष्णवी सातत्याने चांगले गुण मिळवत संगणक अभियंता झाली. अभियांत्रिकीच्या तिसऱ्या वर्षात असताना Baxter नावाच्या अमेरिकन कंपनीने R & D मध्ये काम करण्यासाठी तिची निवड झाली. गेली दोन वर्षे तिने Baxter मध्ये software Enginner म्हणून काम केले. या दोन वर्षात ऑफिसमध्ये तिने स्वतःची ओळख तयार केली. या छोट्या कालावधीत तिने rewards, recognition आणि प्रमोशन देखील मिळवले. तिने नोकरी सोडून जाऊ नये यासाठी तिच्या ऑफिसने तिला बरेच समजावून सांगतिले, परंतु वैष्णवी तिच्या विचारांवर कायमच ठाम असते.

माहिती संकलक : अज्ञात 

प्रस्तुती : सुश्री मीनल केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares