मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ बारीपाडा…भाग -1 ☆ प्रस्तुती – सुश्री हेमा फाटक ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ बारीपाडा…भाग -1  ☆ प्रस्तुती – सुश्री हेमा फाटक ☆ 

वाचाच अन् लाजाही थोडं …

श्रीमंत लोक गरीब लोकांकडून काय शिकू शकतात?

जे लोक दिवस भरात २००रु ची दारु ३००रु ची कोंबडी फस्त करतात त्यांनी ?

बारीपाडा हे महाराष्ट्रातले एक छोटेसे गाव (ता. साक्री, जि. धुळे). पलीकडे गुजरातचा डोंगराळ डांग जिल्हा पसरलेला.

मागील महिन्यात शासन जेव्हा अन्नसुरक्षेच्या ‘भिकमाग्या’ विधेयकाची तयारी करत होतं तेव्हा हे गाव एका वेगळ्याच गडबडीत होतं. गेली दहा वर्षे वनभाज्यांची पाककला स्पर्धा या गावात आयोजित केली जाते. यावर्षी १८० स्त्रियांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. गावाची लोकसंख्या जेमतेम ७००. गावात १०० च्या जवळपास घरे. जवळपासच्या वाडी वस्त्यांमधील स्त्रियांनीही या स्पर्धेत उत्साहाने भाग घेतला. शहरी लोकांना माहित नसलेल्या जवळपास २७ भाज्या या बायकांनी शोधून काढल्या व त्या शिजवून स्पर्धेत मांडल्या.

एका म्हातार्‍या बाईला मी अन्नसुरक्षा विधेयकाबाबत विचारले. ती माझ्याकडे बघतच राहिली….

मी परत विचारल्यावर तिने साधा प्रश्न केला…. ‘ काय देवून राहिले भाऊ त्यात? ’

मी आपलं पोपटपंची केल्याप्रमाणे, ‘ १ रूपयाला ज्वारी/बाजरी, २ रूपयाला गहू, ३ रूपयाला तांदूळ ’ असं सांगितलं.

ती म्हातारी हसून म्हणाली, ‘ ज्वारी आमी खाईना, गहू बी जमत नाई.’ मला वाटले आता हिला तांदूळ तरी उपयोगी पडत असतील.

मी म्हणालो, ‘तांदूळ खाता ना तुम्ही?’

तिने मान डोलावली….. ‘ मग हा तांदूळ तूम्हाला मिळंल की खायला ’….मी.

म्हातारी परत माझ्याच तोंडाकडे टकामका बघत राहिली. ‘ त्यो तसला तांदूळ आमी खाईना.’

मला कळेना शासनाच्या या भिकमाग्या धोरणातील तांदूळात नाही म्हणण्यासारखं काय आहे?

मग मला बाजूला उभ्या असलेल्या एका तरूण पोरानं समजावून सांगितलं… ‘ साहेब, यांच्याकडं जो तांदूळ होतो त्याला आंबेमोहोरासारखा घमघम वास येतो. त्याचं नाव इंद्रायणी. हा तांदूळ हे लोक शेतात स्वत:पुरता घेतात. बाहेर फारसा विकतही नाहीत.’

मला वाटलं ही बाई शेतकरी असेल म्हणून हिला शासनाचा तांदूळ नको.

मग मी त्या तरूणाला विचारले… ‘ गावात इतर गोर गरीब असतील ना. त्यांना तर हे अन्न फायद्याचे ठरेल.’

त्या तरूणाने मला हाताला धरून जवळच असलेल्या ग्रामपंचायतीच्या एका सभागृहात नेले. अतिशय चांगले बांधलेले सभागृह. तिथे विविध माहितीचे फ्लेक्स लावून ठेवलेले होते. त्यात गावची लोकसंख्या, प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या, असली बरीच माहिती होती. एका मोलाच्या माहितीकडे त्याने माझे लक्ष वेधले. त्याने काहीही न बोलताही माझे डोळे खाडकन उघडले.

तिथे लिहीलं होतं…. ” दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्या शून्य “.

या छोट्या गावात जिथे एकही दोन मजली इमारत नाही, ग्रामपंचायतीचे सभागृह, शाळेच्या खोल्या सोडल्या तर एकही सिमेंटची इमारत नाही, तिथे हे गाव अभिमानाने सांगत आहे की आमच्याकडे कोणीही दरिद्री नाही.

— म्हणजे तिकडे दिल्लीला ‘ सगळा भारत कसा दरिद्री आहे आणि कसा भुकेने मरत आहे. त्याला कसे जगवले पाहिजे, ’ असं सर्व नेते सांगत आहेत. आणि इकडे महाराष्ट्र गुजरातच्या सीमेवरचे एक छोटेसे गाव अभिमानाने सांगत आहे की आमच्या गावात दारिद्य्ररेषेखाली कुणीच नाही.

गावात ४ थी पर्यंत शाळा. शाळेत जाणं प्रत्येक घरातील लहान मुलाला अनिवार्य केलेलं. शाळेत रजा न देता गैरहजर राहणार्‍या शिक्षकाला गावानं ५००० रूपयाचा दंड ठरवून दिला आहे. परिणामी इथे नौकरी करायला दांडीबहाद्दर मास्तर घाबरतात. गावात सर्वत्र सिमेंटचे रस्ते. व्यवस्थित नाल्या काढलेल्या. कुठेही घाण कचरा साठलेला नाही.

अंगणवाडी सेविका किंवा ग्रामसेवक यांचे मोबाईल नंबर पंचायतीच्या भिंतीवर ठळकपणे लिहून ठेवलेले. सर्व योजनांची निधीची माहिती लिहून ठेवलेली.

मी विचारले, ‘ याची काय गरज? ’

माझ्या सोबतचा तरुण पोरगा म्हणाला… ‘ कुनीबी फोन लावून इचारू शकते ना भाऊ.’

म्हणजे इकडे दिल्लीला संसदेत विरोधी पक्षांनी गोंधळ घालावा म्हणून सत्ताधारीच प्रयत्न करतात. कारण काय तर गोंधळात महत्त्वाची विधेयके पटापट मंजूर करून घेता येतात. चर्चा होऊ देण्यापेक्षा गुपचूप वाच्यता न होऊ देता काम करण्यावर दिल्लीच्या राजकारणाचा भर. तर इथे एक छोटं गाव आपला कारभार स्वच्छपणे गावकर्‍यांसमोर मांडून पारदर्शी पद्धतीनं काम करत आहे.

क्रमशः… 

संग्राहिका : हेमा फाटक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ भवानी संग्रहालय -एक सत्यातील स्वप्न  ☆ श्री राजीव गजानन पुजारी ☆

श्री राजीव गजानन पुजारी

परिचय 

नांव – राजीव गजानन पुजारी

शिक्षण – बी. ई. (मेकॅनिकल), DBM

नोकरी – मे. किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेड, किर्लोस्करवाडी येथून मॅनेजर मेंटेनन्स म्हणून निवृत्त त्यानंतर वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे कांही वर्षे असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम केले.

आवड – प्रवास, वाचन, लेखन

प्रसिद्ध झालेले साहित्य –

  • कॅलिफोर्निया डायरी हे प्रवास वर्णनात्मक पुस्तक
  • नासाची मंगळ मोहीम ही दहा लेखांची लेखमाला दै. केसरी मध्ये प्रसिद्ध
  • मराठी विज्ञान परिषदेच्या पत्रिका या मासिकांतून
    • जेम्स वेब अंतरीक्ष दुर्बीण,  
    • नासाची आर्टिमिस योजना,
    • लेसर कम्युनिकेशन रिले डेमॉन्स्ट्रेशन

हे लेख प्रसिद्ध

  • अक्षर विश्व् या दिवाळी अंकांत
    • माझी मिनी गुजरात सहल हे प्रवास वर्णन आणि
    • भेदीले शून्य मंडळा ही विज्ञानकथा प्रसिद्ध
  • रेडिओ मराठी तरंग वर
    • विक्रम साराभाई स्पेस सेन्टरला भेट आणि
    • भेदीले शून्य मंडळा या विज्ञान कथेचे वाचन
  • सावरकर शाळेच्या रविवारच्या व्याख्यान मालेत जेम्स वेब अंतरीक्ष दुर्बीण या विषयावर व्याख्यान
  • नृसिंहवाडी येथील पुजारी घराण्याची ई. स. 1435 पासून ते 2022 पर्यंतची वंशावळ संकलित करून श्री दत्त देवस्थानकडे सुपूर्द.

? इंद्रधनुष्य ?

☆ भवानी संग्रहालय -एक सत्यातील स्वप्न  ☆ श्री राजीव ग पुजारी 

औंधच्या यमाई देवीचे दर्शन घेण्यासाठी आम्ही कोल्हापूरहून औंधला गेलो. औंधच्या डोंगरावर यमाई देवीचे सुंदर मंदिर आहे. गाडीने थेट देवळापर्यंत जाता येते. गाडी पार्क केल्यावर एक लहान किल्लावजा बांधकाम आहे. त्याच्या आत देवीचे मंदिर आहे. देवीची मूर्ती काळ्या पाषाणात व जवळजवळ दोन मिटर उंच आहे. मूर्ती खूप देखणी आहे. मंदिर व परिसर अनेक पिढ्यांपासून पंत कुटुंबियांच्या अधिपत्याखाली आहे. त्या कुटुंबातील सध्या हयात असलेल्या गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांनी सात किलो वजनाचे कळस मंदिरावर चढवले आहेत. 

या देवीविषयी अशी हकीकत सांगण्यात येते की, श्रीराम वनवासात असतांना रावणाने सीताहरण केले, त्यामुळे श्रीराम अत्यंत दुःखी होऊन शोक करू लागले. त्यावेळी देवी सीतामाईचे रूप घेऊन श्री रामासमोर आली. त्या शोकाकुल अवस्थेतही रामाने देवीस ओळखले व तो तिला ‘ये माई’ म्हणाला, म्हणून देवीचे नाव यमाई पडले. 

देवीचे दर्शन घेऊन खाली उतरताना प्रसिद्ध भवानी संग्रहालय लागते. हे संग्रहालय औंधचे राजे, पंतप्रतिनिधी यांनी १९३८ मध्ये उभारले. सध्या ते महाराष्ट्र सरकारद्वारा संचलित केले जाते. संग्रहालयामध्ये दुर्मिळ चित्रकृती व शिल्पकृती यांचा उत्कृष्ट संग्रह आहे. 

येथील कलाकृती एवढ्या अप्रतिम आहेत की आपण जणू स्वप्नांच्या दुनियेत आहोत असे वाटत राहते. चित्रकलेच्या दालनांमध्ये बहुतेक सर्व सर्व शैलींची चित्रे ठेवली आहेत. उदा. जयपूर शैली, मुघल शैली, कांग्रा, पंजाब, विजापूर, पहाडी, मराठा वगैरे. प्रसिद्ध भारतीय तसेच विदेशी चित्रकारांची चित्रे येथे बघायला मिळतात. राजा रविवर्मा, एम्.व्ही.धुरंधर,माधव सातवळेकर, कोट्याळकर, रेब्रांट,लिओनार्डो द् विंची,बार्टोना मोरिला,जी.जी.मोरिस वगैरे नामवंत चित्रकारांची चित्रे येथे बघायला मिळतात. स्वराज्याची शपथ, शिवराज्याभिषेक, दमयंती वनवास, पद्मपाणी बुद्ध, लास्ट सपर,मोनालीसा वगैरे प्रसिद्ध चित्रे येथे आपणास पाहायला मिळतात. किरीतार्जुन युध्दाचा  नव्वद चित्रांचा संच बघण्यासारखा आहे. 

येथील धातू व संगमरवरी पाषाणातील शिल्पांचा संग्रहही अप्रतिमआहे.वर्षा,ग्रीष्म,वसंत, हेमंत, शिशिर आणि शरद हे वर्षातील सहा प्रमुख ऋतू. या ऋतूंना स्त्री रूपात कल्पून त्यांची नितांत सुंदर शिल्पे येथे पाहायला मिळतात. प्रत्येक ऋतू शिल्पाला साजेशी काव्यपंक्ती त्या शिल्पाला जणू बोलती करते. उदाहरणार्थ,

        ‘वसंत वाटे अतिगोड साचा, 

        शृंगार केला विविध फुलांचा, 

        वेणीत कानात करी  कटीला, 

        गळ्यात दुर्डित उणे न त्याला’ 

या काव्यपंक्ती आणि ऋतू वसंत ललनेचे मूर्तरूप एकमेकांना साजेसे असेच आहे. नऊवारी साडी, उजव्या खांद्यावर पदर घेऊन, एका हातात फुलांची परडी,तर दुसऱ्या हातात कमलपुष्पे. शिवाय मनगटांवर फुलांच्या माळा, दंडांवर फुलांचाच बाजूबंद आणि फुलांचा कमरबंध असे नानाविध पुष्पालंकार परिधान करीत, गळ्यात मोत्यांचा लफ्फा-साज घालून सुहास्य वदनी ऋतू ‘वसंता’ पाहणाऱ्याला मंत्रमुग्ध करते.  या उलट, ग्रीष्म ऋतू  वा ‘ग्रीष्मकन्या’. उन्हाच्या झळांनी व्याकुळ, थोडीशी थकलेली, अगदी अलंकारही नकोसे वाटणारी. एका हातात पंखा आणि दुसऱ्या हाताने केसांच्या वेणीला मुक्त करणारी ‘ग्रीष्मबाला’ आणि त्याला साजेशी काव्य रचना, 

         ‘घे विंझणा वातची उन्ह आला, 

          ये घाम वेणीभार मुक्त केला, 

          त्यागी तसे आभरणासी बाला,

           हा ग्रीष्म तापे सुकवी तियेला’.   

हातांत आरतीचे  तबक घेऊन, बंधू व पतीस भाळी कुंकूमतिलक लावून दसरा व दिवाळी निमित्ताने ओवाळण्यास  सिद्ध झालेली गुर्जर वेषातील युवती म्हणजे आपली ‘शरद कन्या’. काव्य पंक्ती अगदी तिला साजेशा आहेत.

          ‘मोदे करी सुंदर वेगळा

         बंधूसी तैसी युवती पतीला

        कुर्वंडीते,कुंकुम लावी भाळी

        शरद ऋतूचा दसरा दिवाळी

हेमंत सुंदरीचे वर्णन केले आहे ते असे,

        ‘हेमंत आला तशी थंडी आली 

        घेऊन उणीशी निवारलेली

         शेकावया शेगडी पेटवीली

        बाला सुखावे बहु शोभावीली’

‘शिशिर बाले’चे वर्णन केले आहे ते असे,

      ‘लोन्हा गव्हाच्या बहु मोददायी

      हुर्डा तसा शाळूही शक्तिदायी

      काढावया घेऊनिया विळ्यासी

      बाळा तशी ये शिशिरी वनासी’

 — मराठी शिल्पशैलीत साकार झालेल्या या सहा ऋतूकन्या खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या ‘ऋतूराज्ञी’ शोभाव्यात अशाच आहेत. 

औंधच्या राजांच्या प्रोत्साहानामुळे अनेक शिल्पकार येथे तयार झाले. त्यातील प्रमुख म्हणजे पांडोबा पाथरवट. ते व त्यांची मुले राजाराम व महादेव यांनी साकारलेली हस्तीदंतातील शिल्पे निव्वळ अप्रतिम. एखादा माणूस दगडातून इतके नाजूक कोरीवकाम कसे करू शकतो याचे पदोपदी आश्चर्य वाटत राहते. ही शिल्पे दगडातून नव्हे तर लोण्यातून कोरल्यासारखी वाटतात. 

हेन्री मूर या जगप्रसिध्द शिल्पकाराने बनवलेले ‘मदर अँड चाईल्ड’ हे शिल्प आपणास येथे बघायला मिळते. छत्रपती शिवाजी महाराजांचे दोन पुतळे येथे पहायला मिळतात. एक घोड्यावर बसलेला व दुसरा उभा. उभ्या पुतळ्यात महाराज म्यानातून तलवार बाहेर काढतांना दिसतात. त्यांच्या चेहऱ्यावरील त्वेषपूर्ण भाव निव्वळ अप्रतिम.

संग्रहालयाच्या मध्यभागी एक अवाढव्य बुद्धीबळाचा पट आपले लक्ष वेधून घेतो. पटावर दिसतात ते शस्त्रसज्ज सैनिक-प्यादी,परस्पर विरोधी राजे,वजिर,अंबारीयुक्त हत्ती, घोडे आणि ऊंट. असे म्हणतात की, यावर प्रत्यक्ष बुद्धीबळाचा खेळ खेळला जात असे व प्यादी उचलून ठेवायला माणसे असत.

या संग्रहालयातील प्रत्येक दालन बघायला कमीत कमी एक दिवस लागेल. म्हणजे पूर्ण संग्रहालय बघायला १५ दिवस सुद्धा  अपूरे पडतील. मी तर ठरवलंय 15 दिवस वेळ काढून निवांत आणखी एकदा हे अप्रतिम संग्रहालय बघायचेच.

© श्री राजीव  गजानन पुजारी 

फोन -9527547629

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ उत्तम असामान्य ज्ञान ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? इंद्रधनुष्य ?

☆ उत्तम असामान्य ज्ञान ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे☆

हे आपणास माहित आहे का?

  1. गरम पाणी गार पाण्यापेक्षा लवकर गोठते.
  2. मोनालिसाच्या चित्राला भुवया नाहीत.
  3. “The quick brown fox jumps over the lazy dog” हया इंग्रजी वाक्यात इंग्रजीचे सर्व अक्षर आलेले आहेत.
  4. जीभ हे आपल्या शरीरातील सर्वात जास्त मजबूत स्नायू आहे.
  5. मुंग्या अजिबात झोपत नाहीत.
  6. “I am.” हे इंग्रजीतील सर्वात संक्षिप्त पूर्ण वाक्य आहे.
  7. कोका कोला हे शीत पेय मूलतः हिरव्या रंगाचे होते.
  8. जगात सर्वात जास्त ठेवले जाणारे नाव मोहम्मद
  9. जेव्हा चन्द्र बरोबर आपल्या डोईवर येतो तेव्हा आपले वजन नेहमीपेक्षा जरासे कमी भरते.
  10. वाळवंटातील उडणाऱ्या वालुकणापासून बचावासाठी उंटाला तीन पापण्या असतात.
  11. “abstemious” आणि”facetious” हे फक्त दोनच शब्द आहेत ज्यात इंग्रजीचे स्वर क्रमबध्द आले आहेत.
  12. सर्व खण्डांची इंग्रजीतील नावे ज्या अक्षराने सुरू होतात त्याच अक्षराने संपतात.
  13. अमेरिकेत दरमाणशी दोन क्रेडिट कार्डस् आहेत.
  14. TYPEWRITER हा इंग्रजी टंकलेखन यंत्रावरील एकाच ओळीतील कळ दाबून टाईप होणारा सर्वात लांब शब्द   आहे.
  15. उणे चाळीस डिग्रीला सेल्सिअस व फॅरेनहाईट दोन्ही उणे चाळीसच असतात.
  16. चाॅकलेट खाल्याने कुत्र्याचा मृत्यू होऊ शकतो. कारण चाॅकलेटमधील थिओब्रोमाईड या रसायनाचा कुत्र्याच्या हृदयावर व नर्वस सिस्टमवर विपरित परिणाम होतो.
  17. स्त्रिया तेवढ्याच वेळात पुरुषांपेक्षा दुप्पटवेळा पापण्या ब्लिंक करतात.
  18. आपलाच श्वास रोखून आपण आत्मघात करू शकत नाही.
  19. ग्रंथालयातून सर्वात जास्त चोरले गेलेले पुस्तक”गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकाॅर्ड”– तशी नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकाॅर्डमध्ये नमूद आहं.
  20. डुकरांना आकाशाकडे पाहता येत नाही.
  21. “sixth sick sheikh’s sixth sheep is sick” हे इंग्रजीतील सर्वात उच्चारण्यास अवघड वाक्य मानले जाते.
  22. “Rhythm” हा इंग्रजीतील स्वररहित सर्वात लांब शब्द आहे.
  23. आपण खूप जोरात शिंकलो तर बरगडी फ्रॅक्चर होवू शकते व जर शिंक दाबली तर डोक्यातील वा मानेतील रक्तवाहिनी फुटून मृत्यू ओढवू शकतो.
  24. पत्त्यातील चारही राजे महान राजांचे चित्र आहेत.
    1. – इस्पिक – राजा डेव्हिड
    2. – किलावर – अलेक्झांडर
    3. – बदाम – चार्लमॅगने
    4. – चौकट – जुलियस सिझर
  25. आपल्या जिभेने आपल्याच भुवया चाटणे अशक्य आहे.
  26. 11,11,11,111 × 11,11,11,111 = 12,34,56,78,98,76, 54, 321
  27. ज्या पुतळ्यातील घोड्याचे दोनही पाय हवेत असतात त्याचा स्वार युध्दात मरण पावलेला असतो, तर एक पाय हवेत असेल तर स्वाराचा युध्द-जखमांमूळे मृत्यू झालेला असतो व जर घोड्याचे चारही पाय जमीनीवर असतील तर स्वाराचा नैसर्गिक मृत्यू झालेला असतो.
  28. गोळीरोधक जाकेट, आगनिरोधक, कारचे वायपर व लेसर प्रिंटर्स ही सर्व स्त्रियांनीशोधलेली साधने आहेत.
  29. मध हे एकमेव खाद्यान्न चिरकाल टिकते.
  30. मगरीला आपली जीभ बाहेर काढता येत नाही.
  31. साप तीन वर्षांपर्यत झोपू शकतो.
  32. सर्व विषुववृत्तिय अस्वले डावरी असतात.
  33. विमानात द्यावयाच्या सॅलडमधून प्रत्येकी केवळ एक ओलिव्ह कमी करुन, अमेरिकन विमान कंपनीने 1987 मध्ये 40,000 डाॅलर्स वाचवले होते.
  34. फुलपाखरे पायांनी चव अनुभवतात.
  35. हत्ती हा एकमेव प्राणी आहे जो उडी मारु शकत नाही.
  36. मागल्या 4000 वर्षांमध्ये एकही प्राणी माणसाळला गेलेला नाही.
  37. मृत्युपेक्षा कोळ्याला घाबरणाऱ्यांची संख्या मोठी आहे.
  38. Stewardesses हा इंग्रजी टंकयंत्रावर डाव्या हाताने टाईप केलेला सर्वात लांब शब्द आहे.
  39. मुंग्या विष प्राशनानंतर नेहमी आपल्या उजवीकडे कलतात व मरतात.
  40. वीज दाहिनीचा शोध एका दंतवैद्याने लावला आहे.
  41. 41 रक्ताचा तीस फूट फवारा मारु शकेल इतका फोर्स हृदय निर्माण करते. 
  42. उंदरांची संख्या अकल्पित प्रमाणात वाढते; अगदी दोन उंदीर अठरा महिन्यात दहा लाख होवू शकतात.
  43. इअरफोन एक तास वापरल्यास कानात नेहमीपेक्षा 700 पट विषाणू वाढतात.
  44. सिगारेट लायटरचा शोध आगपेटीच्या आधी लागलेला होता.
  45. बोट-ठशांप्रमाणेच प्रत्येकाचे जीभ-ठसेसुध्दा वेगवेगळे असतात.

संग्राहिका : मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “पन्नाशीच्या पुढे मानसिक गोंधळ का?” ☆ प्रस्तुती – सुश्री वीणा छापखाने ☆

? इंद्रधनुष्य ? 

☆ “पन्नाशीच्या पुढे मानसिक गोंधळ का?” ☆ प्रस्तुती – सुश्री वीणा छापखाने ☆

याची कारणे: वयाच्या तिसऱ्या  टप्प्यातील मानसिक गोंधळ

जेव्हा जेव्हा मी डॉक्टरीच्या चौथ्या वर्षामध्ये विद्यार्थ्यांना क्लिनिकल औषध हा विषय शिकवितो, तेव्हा मी पुढील प्रश्न विचारतो:

वृद्धांमध्ये मानसिक गोंधळाची कारणे कोणती आहेत?

काही सुचवतात: “डोक्यात ट्यूमर”.  मी उत्तर देतो: नाही!

इतर सूचित करतात: “अल्झायमरची सुरुवातीची लक्षणे”.  मी पुन्हा उत्तर दिले.. ‘ नाही!’

त्यांच्या प्रत्युत्तराच्या प्रत्येक नकाराने, त्यांच्या प्रतिक्रिया कोरड्या पडतात.

 जेव्हा मी तीन सर्वात सामान्य कारणे सूचीबद्ध करतो तेव्हा ते अधिक मोकळे होतात:

  – अनियंत्रित मधुमेह

  – मूत्रमार्गात संसर्ग;

  – निर्जलीकरण

 हा विनोद वाटेल, परंतु तसे नाही.  50 वर्षांपेक्षा जास्त लोकांना सतत तहान जाणवणे थांबते आणि परिणामी द्रव पिणे थांबते. जेव्हा त्यांना आसपास द्रव पिण्याची आठवण करून देण्यासाठी कोणीही नसते तेव्हा ते त्वरीत डिहायड्रेट होतात.  निर्जलीकरण तीव्र होते आणि संपूर्ण शरीरावर त्याचा परिणाम होतो.  यामुळे अचानक मानसिक गोंधळ, रक्तदाब कमी होणे, हृदयाची धडधड वाढणे, एनजाइना (छातीत दुखणे), कोमा आणि अगदी मृत्यूसुद्धा.

आपल्या शरीरात आपल्याकडे पाण्याचे प्रमाण 50% पेक्षा जास्त असते तेव्हा द्रव पिण्यास विसरण्याची ही सवय 50 व्या वर्षी सुरू होते.  50 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या लोकांकडे पाण्याचा साठा कमी असतो.  हा नैसर्गिक वृद्ध होण्याच्या प्रक्रियेचा एक भाग आहे.

परंतु यामध्ये आणखी गुंतागुंत आहे.  जरी ते डिहायड्रेटेड असतील, तरी त्यांना पाणी प्यावं अस वाटत नाही, कारण त्यांची अंतर्गत नियंत्रित यंत्रणा फार चांगली काम करत नाही.

 निष्कर्ष:

 50 वर्षांपेक्षा जास्त वयाचे लोक सहजपणे डिहायड्रेट होतात, केवळ त्यांच्यात पाणीपुरवठा होत नाही तर त्यांना शरीरात पाण्याची कमतरता जाणवत नाही.

 50 वर्षांपेक्षा जास्त वय असलेले लोक निरोगी दिसत असले तरी, प्रतिक्रिया आणि रासायनिक कार्यांच्या  कमी झालेल्या कार्यक्षमतेचे कार्य त्यांच्या संपूर्ण शरीरास हानी पोहचवत असते.

 तर येथे दोन सतर्कता घ्यायच्या आहेतः

 १) द्रव्य पिण्याची सवय लावा.  पातळ पदार्थांमध्ये पाणी, रस, चहा, नारळपाणी, दूध, सूप आणि रसाळ फळे, जसे टरबूज, खरबूज, पीच आणि अननस यांचा समावेश आहे;  संत्रा आणि टेंजरिन देखील कार्य करतात.

 महत्वाची गोष्ट अशी आहे की, दर दोन तासांनी आपण थोडासा द्रव पदार्थ पिणे आवश्यक आहे.  हे लक्षात ठेवा !

 २) कुटुंबातील सदस्यांना इशारा: पन्नाशीच्या पुढील लोकांना सतत द्रवपदार्थ द्या. त्याच वेळी, त्यांचे निरीक्षण करा.

जर आपल्याला हे लक्षात आले की ते पातळ पदार्थ नाकारत आहेत, एका दिवसानंतर दुसऱ्या दिवशीही, तर ते चिडचिडे होतील, श्वास घ्यायला त्रास होणे, शांतता व सातत्य (लक्ष)कमी होणे, हे निर्जलीकरणाची जवळजवळ निश्चितच वारंवार येणारी लक्षणे आहेत.

 आपल्या मित्रांना आणि त्यांच्या कुटुंबाला, त्यांच्यासह स्वत: साठी जाणून घेणे आणि आपल्याला निरोगी आणि आनंदी होण्यास मदत करणे आवश्यक आहे.

(द्वारा: अर्नाल्डो लिक्टेंस्टीन, फिजिशियन) अर्नाल्डो लिक्टेंस्टीन (46), वैद्य, हॉस्पिटल दास क्लिनिकस येथे एक सामान्य चिकित्सक आणि साओ पाउलो (यूएसपी) विद्यापीठातील औषध संकाय येथे क्लिनिकल मेडिसिन विभागातील सहयोगी प्राध्यापक आहेत.

संग्राहिका : सुश्री वीणा छापखाने

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ कीर्तनाचा महिमा….अज्ञात ☆ संग्राहक – सुश्री कालिंदी नवाथे ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ कीर्तनाचा महिमा…. अज्ञात ☆ संग्राहक – सुश्री कालिंदी नवाथे ☆

साधारणपणे   ८२- ८३ च्या सुमारास, भिंद्रानवाले पंजाबात आक्रमक होत असताना देशभरात खळबळ माजली होती. त्यावेळी पुण्यात  श्रीमती मंजुश्री खाडिलकर या कीर्तनकार म्हणून सुप्रसिद्ध होत्या. सुप्रसिद्ध गायक श्री त्यागराज यांच्या त्या मातोश्री. पंजाबात जाऊन भिंद्रानवालेला भेटून कीर्तनाच्या माध्यमातून त्याला देशद्रोहापासून परावृत्त करायचे असा एक कार्यक्रम पुण्यातील ज्ञान प्रबोधिनीने करायचा ठरवला. त्याकरता मंजुश्रीताईंना विचारण्यात आले. साथीला ज्ञान प्रबोधिनीतीलच काही मुलींना तयार केले होते. मुळात असा विचार करणे, ह्या सर्व स्त्रियांनी तिथे जाणे, हे त्यावेळी अत्यंत धाडसाचे होते, म्हणूनच इतकी चर्चा. 

आता पंजाबमध्ये जायचे म्हणजे किमान हिंदीतून कीर्तन करावे लागणार होते, त्यामुळे त्याची आधी तयारी करावी लागली. श्री गुरूवाणीमध्ये संत श्री नामदेव महाराज यांची अनेक भजने समाविष्ट आहेत त्यातील निवडक शब्द प्रॅक्टिससाठी घेऊन कीर्तने पुण्यात बसविली व तयार केली.

सगळ्या जणी पंजाबात गेल्या. भिंद्रानवालेला शोधण्यात व भेटण्यात खूप दिवस लागले.कारण सरकार त्याच्या मागावर असल्याने तो सतत मुक्काम बदलायचा. तरी नेटाने प्रयत्न करून त्याला गाठून निरोप दिला की आम्ही पुण्याहून आलोय. श्री नामदेवांचे शब्दकीर्तन तुमच्या समोर करायचे आहे.

तो पर्यंत पंजाबात जिथे शक्य होते तिथे त्यांनी आपले कीर्तन सादर केले. 

अखेर भिंद्रनवालेने कीर्तन सादर करायची परवानगी दिली. कडेकोट बंदोबस्तात हत्यारधाऱ्यांच्या समक्ष हा कार्यक्रम सुरु झाला. आईच्याच शब्दात सांगायचे तर हाडे थिजवणारे वातावरण होते.  

श्रीमती मंजुश्री खाडिलकर ह्यांनी कीर्तन सुरु केले व ज्या क्षणी नामदेवांचा अभंग म्हटला, त्याक्षणी त्याने त्याचे उच्चासन सोडले व श्रीमती खाडिलकरांच्या चरणी नतमस्तक झाला. अक्षरशः त्यांचे चरण पकडले त्याने ! 

त्या याच क्षणाची वाट पहात होत्या. त्यांनी भारतात शांती, एकत्व व सार्वभौमत्व राखण्याचे आणि  सलोखा राखण्याचे आवाहन त्याला केले. त्याच्या डोळ्यात पश्चात्ताप स्पष्ट दिसून येत होता. मान खाली घालून गुडघे टेकून जमिनीवर बसलेल्या त्याने परतीचे सर्व मार्ग बंद झालेले असल्याचे हतबलतेने सांगितले.

पण काम फत्ते झाले ! कारण त्याचे देशद्रोहाचे अवसान त्याच्या अंतर्मनातून गळून पडले ते कायमचेच. नंतर चकमकी झाल्या पण त्याचे अंतर्मन साथ देत नसल्याने त्याचा शेवटी पराजयच झाला. 

गायन कीर्तन कलेवर असामान्य प्रभुत्व असलेल्या, परप्रांतात जाऊन कलेचा प्रभाव पाडून भिंद्रानवालेचे  अवसान घालवणाऱ्या , शूर, धडाडीच्या व देशाबद्दल जाज्वल्य अभिमान असणाऱ्या  कीर्तनकार आदरणीय श्रीमती मंजुश्री खाडिलकर व हा कार्यक्रम आखणारा ज्ञानप्रबोधिनीचा स्टाफ व विद्यार्थिनी व इतर  सर्व  यांना शतश: प्रणाम…

(ज्या कोणी अज्ञात व्यक्तीने मुळात हा लेख लिहिला त्यांचेही आभार. )

(नटराज खाडीलकर यांच्या फेसबुक वॉलवरून साभार.)  

 – अज्ञात 

संग्राहक :– सुश्री कालिंदी नवाथे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ती फुलराणी ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ ती फुलराणी ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆ 

काही माणसं जगावेगळी असतात. त्यांना भेटलं की मन एकदम उल्हसित होतं. कामाप्रती असलेला त्यांचा ध्यास थक्क करतो. ठाण्यातल्या ८० वर्षांच्या मालती मेहेंदळे अर्थात मेहेंदळेआजी हेही असंच एक व्यक्तिमत्व.

लहानपणी झालेल्या एका अपघातामुळे त्यांचा चेहरा विद्रुप झाला. त्यामुळे सर्वसामान्य मुलीसारखं आयुष्य त्यांच्या वाट्याला आलंच नाही. अपघाताच्या खुणांमुळे त्या आत्मविश्वास हरवून बसल्या आणि त्यातच त्यांचं बालपणही हरवलं. त्यांनी आपल्या आयुष्याच्या सीमा आखून घेतल्या. इतरांमध्ये मिसळणं त्या जणू विसरूनच गेल्या. कशीतरी शाळा पार पडली. अर्थात शाळेत असताना त्यांनी धावणे, गोळाफेक, दोरीच्या उड्या अशा ज्या कोणत्या स्पर्धेत भाग घेतला तेव्हा त्यात पहिला नंबरच मिळवला. कॉलेजजीवनही त्यांना फारसं मानवलं नाही. त्यामुळे शिक्षणाची गाडी तिथेच थांबली.

एकदा भावाने त्यांच्यासाठी कागदी फुलं कशी बनवावीत हे दाखवणारं एक पुस्तक आणि काही कागद आणले. पुस्तक इंग्रजीत होतं आणि त्या भाषेशी त्यांची केवळ तोंडओळखच होती. माळ्यावरच्या एका रिकाम्या खोलीत त्यांनी कागदी फुलं बनवायला सुरुवात केली आणि त्यांचं आयुष्य बहरून गेलं.

कालांतराने त्यांचं लग्न झालं आणि त्या रोह्यावरून मुंबईतल्या पार्ल्यात आल्या. दोन मुली झाल्या आणि काही वर्षांनी पती अचानक वारले. त्या पुन्हा माहेरी आल्या. नंतर त्यांचा पुनर्विवाह होऊन मेहेंदळे बनून त्या ठाण्यात आल्या. चांगले दिवस सुरू झाले. त्यांचे यजमान स्वभावाने खूप चांगले होते. मधल्या काळात त्या सामाजिक कार्यक्रमात सहभागी झाल्या. ‘जीवनज्योती’ या पतपेढीच्या स्थापनेत त्यांचा मोठा सहभाग होता. आजींनी या संस्थेसाठी बरीच वर्षं काम केलं.

मेहेंदळेकाका अचानक गेल्यावर आजी परत फुलं बनवू लागल्या. अचानक कोणीतरी त्यांना सांगितलं की या फुलांचं आपण प्रदर्शन भरवू या. प्रदर्शन भरवण्याइतपत आत्मविश्वास त्यांच्याकडे नव्हता. त्यांच्याकडे फुलं बनवायला येणाऱ्या मुलींनी त्यांना प्रोत्साहित केलं आणि प्रदर्शन पार पडलं. एवढी सुंदर आणि जिवंत फुलं पाहून ती कागदी आहेत यावर कोणाचा विश्वासच बसेना. प्रदर्शन अत्यंत यशस्वी झालं. आजी मनातून खूप आनंदी झाल्या. जवळ जवळ पन्नास वर्षं जोपासलेल्या छंदाचं सार्थक झालं. मग मात्र आजींनी मागे वळून बघितलं नाही. नंतर एल अॅण्ड टी या कंपनीसाठीही त्यांनी प्रदर्शन भरवलं. तुर्भेच्या टी.आय.एफ.आर. या प्रतिष्ठित संस्थेने आजींच्या फुलांचं प्रदर्शन आयोजित केलं आणि तिथल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आजींचं खूप कौतुक केलं. मधल्या काळात फुलं बनवायला शिकण्यासाठी मेहेंदळेआजींकडे तरुण मुलींचा ओघ सुरू झाला. त्यांचा क्लास खूप लोकप्रिय झाला.

आजी नंतर अमेरिकेला गेल्या , भारतभर फिरल्या. सगळीकडची फुलं बघितली आणि घरी येऊन त्यांनी ती साकारली. आजी फक्त क्रेप पेपरचीच फुलं बनवतात. वेगवेगळ्या रंगाचे, छटांचे क्रेप पेपर शोधत असतात. क्वचितप्रसंगी त्या रंग वापरतात. कृष्णकमळ आणि बकुळ ही दोन फुलं बनवणं आव्हानात्मक आहे, असं त्या सांगतात. आज आजींना त्यांच्या या छंदामुळे अजिबात वेळ नाही. त्या एकट्या राहत असल्या तरी त्या एकट्या कधीच नसतात. परिस्थिती टोकाची प्रतिकूल असतानाही सुंदर जगावं कसं हे मेहेंदळेआजींकडे बघून सहज कळतं.

संग्राहिका : सुश्री मीनल केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ आपल्या भारतातील विलक्षण, अद्वितीय गावे… ☆ प्रस्तुती – सुश्री हेमा फाटक ☆

? इंद्रधनुष्य ?

आपल्या भारतातील विलक्षण, अद्वितीय गावे… ☆ प्रस्तुती – सुश्री हेमा फाटक ☆ 

आपल्या भारतातील विक्षण, अद्वितीय गावे

१ ) आळंदी गाव (महाराष्ट्र) – आळंदी या गावात आजही (गाव वेशीत) मास – मटण मिळत नाही या गोष्टीला 700 वर्षे पुर्ण झालीत.

२ ) शनिशिंगणापूर (महाराष्ट्र) – संपूर्ण गावात, एकाही घराला कडी-कोयंडा नाही.

३ ) शेटफळ (महाराष्ट्र) – प्रत्येक ग्रामस्थाच्या घरात, कुटुंबाचा सदस्य असल्यासारखी सर्पराजाची उपस्थिती.

४ )- हिवरे बाजार (महाराष्ट्र) – भारतातील सर्वात “श्रीमंत” खेडे.  ६० अब्जाधीश घरे. एकही “गरीब” नाही. सर्वाधिक GDP असणारं खेडं.

५ )– पनसरी (गुजरात) – भारतातील सर्वात “अत्याधुनिक” खेडेगांव. गावातील सर्व घरात CCTV जोडण्या असून, Wi-Fi सुविधाही आहेत. गावातील सर्व ‘पथदीप’ सौर उर्जेवर चालतात.

६ )- जांबुर (गुजरात) – भारतीय वंशाचे असूनही, सर्व नागरिक “आफ्रिकन” वाटतात. [परिसरात आफ्रिकन गांव अशीच ओळख]

७ ) कुलधारा (राजस्थान) – “अनिवासी” गांव. गांवात कोणीही रहात नाही. घरे बेवारस सोडलेली आहेत.

८ )- कोडिन्ही (केरळ) – जुळ्यांचे गांव. जवळपास प्रत्येक घरात जुळं.

९ )– मत्तूर (कर्नाटक) -दैनंदिन व्यवहारासह सगळ्याच कामकाजासाठी “संस्कृत” भाषेचा अनिवार्य वापर करणारे गाव.

१० )- बरवानकाला (बिहार) – ब्रम्हचाऱ्यांचे गांव. गेल्या ५० वर्षांपासून गावात लग्न-सोहळाच नाही.

११ )– मॉवलिनॉन्ग (मेघालया) – ‘आशिया’ खंडातील सर्वात “स्वच्छ” गांव. पर्यटकांना भुरळ घालणारे लहानशा दगडावरील महाकाय पत्थराचे निसर्ग-शिल्प.

१२ )– रोंगडोई (आसाम) – बेडकांचे लग्न लावल्यास पर्जन्य सुरू होतो, अशी श्रद्धा (की अंधश्रद्धा ?) जपणारं गांव. असं लग्न हा ‘ग्रामसण’ च असतो.

१३ )- कोर्ले गांव,रायगड जिल्हा (महाराष्ट्र) – Korlai  विलेज स्वातंत्र्यानंतर व पोर्तुगीज गेल्यानंतरही ” पोर्तुगीज “ भाषा दैनंदिन व्यवहारात वापरणारे गाव.

१४ )-मधोपत्ती गाव( उत्तर प्रदेश) – एका गावातून ४६ पेक्षा जास्त माणसे  IAS झालेले हे गाव, ९० टक्केपेक्षा जास्त सरकारी नोकरीमध्ये प्रथम दर्जाचे अधिकारी देणारे हे गाव भारताने नमूद केले आहे…

१५ )– झुंझुनू (राजस्थान) – फौजींच गाव, एका घरातून तीन ते चार फौजी, पाच पाच पिढ्यांपासून  प्रत्येक घरात फौजी, खरी देशसेवा म्हणजे हे गाव आणि गावातली प्रत्येक व्यक्ती… ६ हजार पेक्षा जास्त सेवानिवृत्त, आणि ११ हजारहून  जास्त फौजी देशाच्या विविध भागात नोकरीवर रुजू…

— असाच वेगळेपणा जपणारी आणखीही गावे असतील. माहिती मिळवा, आणि इतरानांही माहित करून द्या.

संग्राहिका : हेमा फाटक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ माहिती आहे तुम्हाला? देशातला पहिला “मॉल” शंभर वर्षांपूर्वी लातूरात उभा राहिला…!! – लेखक – अज्ञात  ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ माहिती आहे तुम्हाला? देशातला पहिला “मॉल” शंभर वर्षांपूर्वी लातूरात उभा राहिला…!!  – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

मॉल म्हणजे काय? तर मोठी इमारत किंवा कनेक्ट इमारतींची मालिका, ज्यामध्ये विविध वस्तू एकत्र मिळणाऱ्या दुकानांची मालिका… ज्यात हॉटेल्स पण असतील असे ठिकाण… जगात 19 व्या शतकात बांधकामात अनेक प्रयोग झाले.. रचनात्मक शहरे उभी राहिली… भारतात ब्रिटिशांनी त्यांच्या शैलीत अनेक इमारती बांधल्या… पण देशात पहिल्यांदा शहराच्या मध्यभागी भव्य गोलाकार मार्केट उभं करून शहरातले सगळे रस्ते जोडण्याची अभिनव कल्पना सुचली ती लातूरकरांना… सालं होतं 1917..  देशभरात ब्रिटिशांची सत्ता होती. मात्र लातूरवर निजामशाहीची हुकूमत होती, ब्रिटिशांबरोबर तह करून आपलं राज्य चालविणाऱ्या निजामकाळात लातूरमधल्या तत्कालीन व्यापाऱ्यांच्या डोक्यात अशा मार्केटची कल्पना सुचली की, सगळ्या गोष्टी लोकांना एकत्र मिळाव्यात. मग त्याची रचना पक्की झाली… मध्यभागी देवीची प्रतिष्ठापना.. त्यामागे आपल्या पाठीशी आदीशक्तीचे पाठबळ आहे ही धारणा प्रत्येकाच्या मनात असावी…  8 जून 1917 रोजी लातूर मध्ये “गंजगोलाईची स्थापना करण्यात आली.. त्याचे उदघाटन, निजामकाळातील सुभेदारी म्हणजे आयुक्त कार्यालय गुलबर्गास्थित होतं, त्याचे सुभेदार होते राजा इंद्रकरण… त्यांच्या हस्ते झाले आणि आजच्या व्याख्येप्रमाणे देशातला पहिला “मॉल” लातूरात उभा राहिला.

‘गंज’ हा उर्दू शब्द आहे, त्याचा अर्थ होतो वस्तूबाजार (आणि मराठवाड्यात, मोठे गोल भांडे असते दूध वगैरे काढण्यासाठी किंवा ठेवण्यासाठी त्यालाही गंज म्हणतात) अशी गोल, वस्तूबाजार असलेली बाजारपेठ उभी राहिली..  त्याला 16 रस्त्यांनी जोडण्यात आले… या सोळा रस्त्यांवर ठोक व्यापारी दुकाने वसविली गेली.. एक रस्ता फक्त सोनारासाठी म्हणजे सराफ लाईन, दुसरा रस्ता फक्त कापड दुकान – ती कापड लाईन, एक लाईन अन्नधान्याची – भुसारलाईन… असे 16 रस्ते – सोळा ठोक व्यापाराच्या लाईन.. असं देशात कुठे आहे का? तर आहे, पण लातूरची गंजगोलाई उभी राहिल्यानंतर दिल्लीत 1921 ला ब्रिटिश अधिकारी एडविन लुटनेस यांनी गोल मार्केट वसविले.. कमी जागेत अधिक दुकाने दळणवळणासाठी सोयीस्कर ठरतात म्हणून ही रचना केली… पुढे 1925 मध्ये रायपूरलाही गोल मार्केट ब्रिटिशांनी वसविले.

लातूरची गोलाई एतद्देशीय लोकांनी त्यांच्या कल्पनेतून उभी केली. या स्थानिक व्यापाऱ्यांनी आपल्या जागेची मागणी,  त्याकाळी लातूरची पेशकारी ज्या औशावरून चालायची – तिथले पेशकार  सुजामतअली यांच्या मदतीने हैद्राबाद निजाम दरबारी पोहचवली व जागा उपलब्ध करून घेतली..  पुढे 1945 ला परदेशावरून आलेल्या फय्याजुद्दीन या वास्तूरचनाकाराच्या मदतीने कच्ची गोलाई पक्की झाली…!!

1905 ला लातूरला तहसील दर्जा मिळाला. त्यापूर्वी नळदुर्ग हे तहसील कचेरीचे ठिकाण होते. 1923 ला मिरज लातूर रेल्वे सुरु झाली आणि लातूरची वाढ व्यापारी केंद्र म्हणून झाली… या व्यापारी पेठेची ख्याती देशभर पसरली. त्यातून गंजगोलाई आणि तिचे वैशिष्ट्य देशभर पसरले… गंजगोलाई हे लातूरच्या इतिहासातील सोनेरी पान आहे… आणि लातूरकरांच्या मनामनात या गंजगोलाईबद्दल अभिमान आहे. ते लातूरकरांच्या अभिमानाचे प्रतीक आहे… अशा या गंजगोलाईचा आज वर्धापन दिन आहे… चला लातूर संस्कृतीचा अभिमान ठेवू या… देशभर तो अधिक तेजाने पसरवू या…!!       

लेखक – अज्ञात

संग्राहक : श्री सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ डोंगर – झाडे – आणि पाणी ☆ प्रस्तुती – श्री विनय माधव गोखले ☆

श्री विनय माधव गोखले

? इंद्रधनुष्य ?

☆ डोंगर – झाडे – आणि पाणी ☆ प्रस्तुती – श्री विनय माधव गोखले ☆

डोंगर आणि झाडाशिवाय जमिनीत पुरेसे पाणी साठवणे अशक्य आहे. 

1) डोंगर हे जमिनीतील पाणीसाठ्याचे बाह्य कवच असते. उन्हाळ्यात डोंगराचे बाह्य आवरण तापते. मात्र  भूपृष्ठापर्यंत उष्णता पोहचू न शकल्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन होत नाही. याउलट डोंगर फोडला तर उष्णता थेट पोहचते व डोंगराच्या पोटातील ओलावा संपुष्टात येतो. 

2) पाणी जमिनीत दोन प्रकारे साठवले जाते. एक मृत साठ्याचे पाणी आणि दुसरे जिवंत साठ्याचे पाणी . 

मृत साठ्याचे पाणी हे दहा फुटावर पाझरते तर जिवंत साठ्याचे पाणी दहा ते १०० फूट व त्यापेक्षा अधिक पातळीवर आढळते.

जेेव्हा पाऊस पडतो तेव्हा नदी-नाल्याचे पाणी मृत साठ्याच्या स्वरूपात जमिनीत साठले जाते, जे की एकदा उपसले की संपून जाते. आणि जोपर्यंत ओढे वगळ वहात असतात तोपर्यंतच विहीर व बोअरला पाणी असते. 

तर जिवंत साठ्याचे पाणी आज तरी भूगर्भातून संपलेले आहे. कारण जिवंत पाणी खोलवर जाण्यासाठी नैसर्गिक यंत्रणा हवी असते. 

3) एक पाण्याचा थेंब खडकातून पाझरून भूगर्भात जाण्यासाठी एक वर्षाचा कालावधी लागतो. म्हणजेच दहा फुटांवर जाण्यासाठी दहा वर्ष लागतात. 

4)  एक झाड एका दिवसाला दहा लिटर पाणी जमिनीत ५० फुटावर घेऊन जाते. कारण झाड हे जमिनीच्या वर जेवढ्या उंचीपर्यंत असेल तेवढीच खोलवर त्याची मुळे असतात. म्हणून झाडं ही निसर्गाची बिनाखर्चाची पाईपलाईन आहे, 

5) एक लिंबाचे झाड एकूण दहा हजार लिटर पाणी पावसाळ्यात जमिनीत घेऊन जाऊ शकते. याचा अर्थ आपल्या परिसरात किमान ३० झाडं लिंब, चिंच ,जांभूळ, आंबा , मोह, अर्जुन या वर्गातील नक्कीच असतील. म्हणून मृत साठ्याचे पाणी पाझरत रहात असावे. 

6) एक वडाचे किंवा पिंपळाचे मोठे झाड एका हंगामासाठी एक कोटी लिटर पाणी जमिनीत घेऊन जाते.आणि ते ही पन्नास फुटाच्याही खाली. वडाची व पिंपळाची मुळे पाषाणालाही भेदून ८०० ते १००० फुटावर पोचतात. 

एक कोटी लिटर म्हणजे एका विहीरीचा शंभर वेळा उपसा करावा एवढे पाणी. याचा गणितीय हिशोब सांगायचा झाला तर ३५ एकर शेतीचे रब्बी हंगामाचे भरणपोषण होते, आणि वर्षभर बागायतीसाठी १५ एकरला पुरेल एवढे जिवंत साठ्याचे पाणी एक वड किंवा पिंपळ पुरवतो. 

म्हणून आपल्या शेताच्या शेजारी मोकळी पडीक जागा असेल तर किमान एक असा महावृक्ष लावा. 

आपण एका बोअरवेलसाठी एक लाख रु.खर्च करतो. एका विहीरीसाठी पाच लाख रु. खर्च करतो. पण पाणी लागण्याची  कुठलीच शाश्वती नसते. 

— कारण आपली नियत ही धूर्त असते. डोंगर संपुष्टात आणण्याची, डोंगरावरील झाडं तोडण्याची, बांध संपवून बोडके करण्याची नियत असते. म्हणून मग पाणी येणार तरी कुठून? 

6) पाण्याचे दुर्भिक्ष हे मानवनिर्मित आहे. देवाला दोष देण्यात अर्थ नाही. खरे दोषी आपण व आपला स्वार्थ आहे. 

हवा ही ऊर्जा आहे.

पाणी हे अमृत आहे

तर माती ही जननी आहे.

तर झाडं हे जीवनदायी आहेत. —

झाड नसेल तर हवा रोगट होते. पाणी विषासमान होते आणि माती वांझ होवून शापीत होते.

7) झाडांचं मूल्य समजून घ्या… आणि दहा रूपयाचं फक्त एक झाडं शेत असेल तर शेतात, नाही तर माळरानावर, डोंगरावर कुठेही जगविण्याची जबाबदारी घ्या…. 

या शिवाय दुसरा कुठलाच पर्याय शिल्लक नाही. तुम्ही गावाचे, शहराचे, देशाचे, समाजाचे आणि स्वहिताचे जर काही देणं लागत असाल तर एवढचं साधं काम करा. 

झाडं माणसाचे मन, मस्तिष्क व जीवन हिरवंगार करत असतात. 

8) एक सदैव लक्षात असू द्या. झाडांची पाणी साठवण्याची व वाहण्याची क्षमता त्यांच्या  वयावर व प्रकारावर अवलंबून असते. शक्यतो देशी झाडे लावा.

— “झाडे लावा – झाडे जगवा” —

माहिती प्रस्तुती : विनय माधव गोखले

भ्रमणध्वनी – 09890028667

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “सोन्याची गट्टी फू”… भाग-1 – सुश्री शीतल श्रीधर माडगूळकर ☆ सुश्री सुलू साबणे जोशी ☆

? मनमंजुषेतून ?

☆ “सोन्याची गट्टी फू”… भाग-1 – सुश्री शीतल श्रीधर माडगूळकर ☆ सुश्री सुलू साबणे जोशी ☆

गदिमांचे आपली आई बनुताई यांच्यावर विलक्षण प्रेम होते. आई बनुताई खूप छान ओव्या रचत असत. पपा आपल्या कवितेला आईच्या ओव्यांची दुहिता (लेक) म्हणायचे. ते म्हणत, “आईच्या गीतगंगेतली कळशी घेऊनच मी मराठी शारदेचे पदप्रक्षालन करीत असतो.” आईंना दासबोध, करुणाष्टके, मनाचे श्लोक तोंडपाठ होते. त्या सकाळी तुळशीकट्ट्यावर खूप सुंदर रांगोळी रेखाटत असत.

माझा मुलगा आणि त्यांचा पणतू सुमित्र याच्यावर आईंचे विलक्षण प्रेम होते. त्यांच्यातले अर्धे डाळिंब आवर्जून त्याच्यासाठी राखून ठेवलेले असे. त्याच्या जन्मामुळे त्यांना काशीयात्रेचे पुण्य मिळाले अशी त्यांची भावना होती. मला त्या म्हणायच्या, “किती गुणी पोर आहे ग! असे पोर दररोज एक घरात जन्मले तरी चालेल.” मला या त्यांच्या बोलण्याची खूप गंमत वाटायची.

दररोज सकाळच्या कोवळ्या उन्हात त्या पंचवटीच्या मागच्या अंगणात काठी घेऊन फेऱ्या मारत. मग तुळशी कट्ट्यावर बसून आम्हाला पालेभाजी निवडून देत, किंवा ताक घुसळून छान ताजे लोणी काढून देत.

एके दिवशी त्या असच काठी हातात धरून मागच्या अंगणात फेऱ्या मारत होत्या. माझ्या सासूबाई विद्याताई तिथेच व्हरांड्यात चटईवर बसून भाजी चिरून देत होत्या. मी स्वयंपाकघरात सकाळचा नाश्ता बनवत होते.

तो सव्वा वर्षाचा होता त्यावेळी.. आपल्या दोन्ही आज्यांच्या संगतीत सुमित्र आपल्या लाल जीपगाडीत बसून, पायडल न मारता पायांनी ती छोटी जीप चालवत होता.

थोडा वेळ गेला आणि एकदम सुमित्रचे जोरात कळवळणे आणि मोठ्या आवाजात रडणे मला ऐकू आले. मी धावत मागच्या अंगणात गेले….. पपा खोलीत निघून गेले होते.. ताईंनी सुमित्रला जवळ घेतले होते आणि त्या त्याच्या लाल झालेल्या गोऱ्यापान, गोबऱ्या गालांवर हळुवार फुंकर घालत होत्या…. मला काहीच कळेना… नंतर कळले की आई अंगणात काठी घेऊन फेऱ्या मारत असताना सुमित्र त्याची जीप जोरात चालवत होता आणि अगदी त्यांच्या पायाजवळ नेऊन थांबवत होता… पपांनी त्याला दोनतीनदा सांगितले, “सोन्या, असे करू नकोस.” त्यांचे नेहमी सर्व ऐकणाऱ्या सुमित्रला त्या दिवशी कसला चेव चढला माहिती नाही, त्यांचे न ऐकता तो परत परत तसेच करत राहिला. मग मात्र पपांचा संताप अनावर झाला. अनवधानाने त्यांनी त्याच्या एक जोरात कानशिलात दिली. पपांचे हात जरी गाद्या बसवल्यासारखे मऊ होते तरी मुलांना मारताना मात्र त्यांना खूप लागत.

सुमित्रच्या गोऱ्या, गोबऱ्या गालावर चार बोटे उठली होती…. त्याला जवळ घेऊन मी शांत केले. इतक्या छोट्या नातवाला आपण मारले याचे पपांनाही खूप वाईट वाटले. ते बराच वेळ खोलीत झोपून राहिले. नीट जेवलेही नाहीत.

मी सुमित्रला नंतर समजावून सांगितले की, ‘पपा आजोबांना सांग की मी परत असे करणार नाही.’ त्याला हेही सांगितले की अशी पणजीआजीच्या अंगावर गाडी नेलीस तर चालताना घाबरून तिचा तोल जाऊन ती पडली असती आणि तिला खूप मोठा बाऊ झाला असता. मग मात्र तो घाबरला आणि मला ‘सॉरी’ म्हणाला. पण पपांच्या जवळ जाऊन माफी मागायला काही तयार होईना.

जवळजवळ दिवसभर तो त्यांच्या जवळपासही फिरकला नाही. आडून आडून हळूच पपांकडे बघत होता. संध्याकाळी पपा फिरून आले. आल्या आल्या सुमित्रला जोरात हाक मारली, 

“सोन्याss”, तो सगळं विसरून आपल्या लाडक्या आजोबांकडे पळत पळत गेला. त्याला कडेवर घेऊन त्याच्या अस्पष्ट झालेल्या गालांवरच्या वळाची पापी घेऊन पपांनी त्याला कुरवाळले… आणि त्याच्या आवडीचे एक मोठे जेमच्या गोळ्यांचे पाकीट त्याला दिले…

त्याने आपल्या बोबड्या स्वरात पपांना विचारले, “आता पलत मला नाही ना मालनाल? मी अशे कलनाल नाही पलत.” 

यावर पपा त्याचा पापा घेऊन मोठ्या प्रेमभराने म्हणाले, “नाही ले माझ्या लाज्या…” 

मला त्या दोघांचे प्रेम बघूनच डोळ्यांत अश्रू आले… पपांना कोणीतरी विख्यात ज्योतिषांनी सांगितले होते की, तुम्ही ज्या दिवशी गाडी घ्याल त्या दिवशी तुमच्या आईला गमवाल. खेळण्यातली जीपगाडी पण आपल्या आईला चुकून लागली तर..?  हा विचारही त्यांच्या हळव्या कविमनाला सहन झाला नव्हता…

क्रमशः…

  – सुश्री शीतल श्रीधर माडगूळकर

संग्राहिका – सुश्री सुलू साबणे जोशी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares