ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ १९ सप्टेंबर – संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? ई-अभिव्यक्ती – संवाद ☆ १९ सप्टेंबर – संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित – ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

प्रिया तेंडुलकर

 प्रिया तेंडुलकर या सुप्रसिद्ध नाटककार विजय तेंडुलकर यांची कन्या. पण ही त्यांची खरी ओळख नव्हे. कारण त्यांनी स्वतःचे विचार, अभिनय आणि लेखन यातून नाट्य, चित्र व साहित्य क्षेत्रात स्वतंत्र स्थान निर्माण केले होते.

अंकुर, देवता, माहेरची माणसं, राणीनं डाव जिंकला, गोंधळात गोंधळ, मुंबईचा फौजदार इत्यादी चित्रपटातून त्यांनी कामे केली. शाम बेनेगल दिग्दर्शित ‘अंकुर’ हा त्यांचा पहिला चित्रपट.

त्या भारतातील पहिल्या टी.व्ही. स्टार म्हणून ओळखल्या जातात. ‘रजनी’ ही त्यांनी काम केलेली दूरदर्शन मालिका अतिशय लोकप्रिय झाली होती. या व्यतिरिक्त प्रिया तेंडूलकर शो, जिम्मेदार कौन, किस्से मिया बिबी के, हम पाॅच या मालिकात त्यांनी काम केले होते. ‘दामिनी’ ही त्यांची मराठी मालिकाही खूप गाजली होती.

एक हट्टी मुलगी, गिधाडे, ती फुलराणी या मराठी नाटकातही त्यांनी भूमिका केल्या होत्या.

फर्स्ट पर्सन हे त्यांचे आत्मचरित्र. असंही, पंचतारांकित या नावाची ललित पुस्तके त्यांच्या नावावर आहेत. शिवाय जन्मलेल्या प्रत्येकाला, जावे तिच्या वंशा, ज्याचा त्याचा प्रश्न हे त्यांचे कथासंग्रह प्रकाशित झाले आहेत.

वयाच्या अवघ्या अठ्ठेचाळीसाव्या वर्षी त्यांचे दुःखद निधन झाले.आज त्यांचा स्मृतीदिन.त्यांच्या कर्तृत्वास सलाम. 🙏

☆☆☆☆☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ: विकिपीडिया.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ १८ सप्टेंबर – संपादकीय – सौ. गौरी गाडेकर ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सौ. गौरी गाडेकर

? ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ १८ सप्टेंबर – संपादकीय – सौ. गौरी गाडेकर,  ई–अभिव्यक्ती (मराठी) ?

शिवाजी सावंत

शिवाजी गोविंदराव सावंत (31 ऑगस्ट 1940 – 18 सप्टेंबर 2002) हे लेखक व मुख्यत्वे कादंबरीकार होते. त्यांची ‘मृत्युंजय’ ही पौराणिक कादंबरी मराठी कादंबऱ्यांत मानदंड मानली जाते.

शिवाजी सावंतांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा गावात, एका शेतकरी कुटुंबात झाला. शालेय शिक्षण तिथेच झाले. नंतर कोल्हापुरात बी. ए. चे प्रथम वर्ष पूर्ण करून त्यांनी G. C.D. ही वाणिज्य शाखेतील पदविका घेतली.

टायपिंग, शॉर्टहँडचा कोर्स करून काही काळ त्यांनी कोर्टात कारकुनाची नोकरी केली. नंतर 1962 ते 1974 या काळात ते कोल्हापुरातील राजाराम प्रशालेत शिक्षक होते.

पुढे 1974ते 1980 या काळात त्यांनी पुण्यात महाराष्ट्र सरकारच्या शिक्षणविभागाच्या ‘लोकशिक्षण’ या मासिकाचे सहसंपादक व नंतर संपादक म्हणून काम केले.1983मध्ये स्वेच्छानिवृत्ती घेऊन त्यांनी  फक्त लेखनावरच लक्ष केंद्रित केले.

प्रदीर्घ संशोधन, चिंतन, मनन यातून त्यांची रससंपन्न अशी ‘मृत्युंजय’ ही वास्तववादी कादंबरी जन्माला आली.

यानंतर त्यांनी ‘छावा’ व ‘युगंधर’ या कादंबऱ्या, ‘कवडसे’, ‘कांचनकण’ हे ललित निबंधसंग्रह, ‘अशी मने,असे नमुने’, ‘मोरावळा’ इत्यादी व्यक्तिचित्रे, ‘ लढत’  व  ‘संघर्ष’ ही चरित्रे लिहिली. त्यांनी ‘छावा’ व ‘मृत्युंजय’चं नाट्यरूपांतरही केलं.

त्यांची काही पुस्तके इंग्रजी भाषेत अनुवादित झाली आहेत.

‘मृत्युंजय’ या कादंबरीवर आधारलेली काही मराठी, हिंदी नाटकेही रंगभूमीवर आली आहेत.

1995 पासून काही वर्षे ते महाराष्ट्र साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष होते.

1983 मध्ये बडोदा येथे भरलेल्या बडोदे मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.

‘मृत्युंजय’साठी त्यांना महाराष्ट्र राज्य पुरस्कार, न. चिं. केळकर पुरस्कार, ललित मासिकाचा पुरस्कार, भारतीय ज्ञानपिठाचा ‘मूर्तिदेवी पुरस्कार’, ‘फाय फाउंडेशन पुरस्कार’ व इतरही अनेक पुरस्कार मिळाले.

प्रतिमा दवे यांनी केलेल्या ‘मृत्युंजय’च्या गुजराती भाषांतराला गुजरात सरकारचा व केंद्रीय असे दोन साहित्य अकॅडमी पुरस्कार मिळाले.

‘छावा’साठीही शिवाजी सावंतांना महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला.

सावंतांना पुणे विद्यापीठाचा व महाराष्ट्र सरकारचा जीवन गौरव पुरस्कार, तसेच ‘कोल्हापूर भूषण’ पुरस्कार मिळाला.

भारत सरकारच्या मानव संसाधन व सांस्कृतिक कार्यालयाकडून त्यांना ज्येष्ठ साहित्यिक शिष्यवृत्ती देण्यात आली होती.

पुणे येथील ‘मृत्युंजय प्रतिष्ठान’तर्फे दर वर्षी मृत्युंजयकार शिवाजीराव सावंत स्मृती साहित्य आणि स्मृती समाजकार्य या नावाचे दोन पुरस्कार देण्यात येतात.

त्यांच्या जन्मगावातील श्रीमंत गंगामाई वाचन मंदिराच्या वतीने दर वर्षी मृत्युंजयकार शिवाजी सावंत कादंबरी पुरस्कार देण्यात येतो.

भालचंद्र फडके

भालचंद्र दिनकर फडके (13 मे 1925 ते 18 सप्टेंबर 2004) हे मान्यवर समीक्षक होते.

त्यांचा जन्म धारवाड येथे झाला. सोलापूरला शालेय व महाविद्यालयीन शिक्षण झालं. पुणे विद्यापीठातून मराठी घेऊन एम. ए. केल्यानंतर त्यांनी मराठी कथा या विषयावर विद्यावाचस्पती (पी एच. डी.) ही पदवी मिळवली.

सुरुवातीला फडकेंनी भारतीय युद्ध खात्यात नोकरी केली. नंतर निवृत्तीपर्यंत ते अध्यापन करत होते. प्रथम माध्यमिक शिक्षक, नंतर महाविद्यालयात 14 वर्षे अध्यापन केल्यानंतर ते पुणे विद्यापीठात अधिव्याख्याता, मग प्रपाठक व शेवटी निरंतर प्रौढ शिक्षण संचालक म्हणून निवृत्त झाले.

त्यांची समीक्षा मर्मग्राही, सामाजिक भान जागे करणारी, साक्षेपी व प्रेरणा देणारी होती.

‘सहा कथाकार’ हे संकलन, ‘कथाकार खानोलकर’, तसेच ‘मराठी लेखिका : चिंता आणि चिंतन’, ‘दलित साहित्य -वेदना आणि विद्रोह’ या समीक्षा आणि ‘समुद्रकाठची रात्र’ ही त्यांची काही पुस्तके. डॉ. आंबेडकरांवर त्यांनी चरित्रपर लेखन केले.

1973 ते 1976 या काळात ‘मराठी साहित्य पत्रिका’चे (पुणे)ते संपादक होते. त्यांची संपादकीय व समीक्षकीय दृष्टी चिकित्सक होती.

आज शिवाजी सावंत व भालचंद्र फडके यांचा स्मृतिदिन. त्यानिमित्त त्यांना भावपूर्ण आदरांजली.🙏🏻

सौ. गौरी गाडेकर

ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : साहित्य साधना, कऱ्हाड शताब्दी दैनंदिनी, विकीपीडिया, विवेक महाराष्ट्र नायक.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈




ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ १७ सप्टेंबर – संपादकीय – सौ. उज्ज्वला केळकर ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? ई-अभिव्यक्ती – संवाद ☆ १७ ऑगस्ट -संपादकीय – सौ. उज्ज्वला केळकर – ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

रघुवीर सामंत – रघुनाथ जगन्नाथ सामंत यांचा जन्म २४ डिसेंबर १९०९ मधे सांगली येथे झाला. ते रघुवीर सामंत किंवा कुमार रघुवीर या नावाने लेखन करत. त्यामुळे ते रघुवीर सामंत या नावानेच ओळखले जाऊ लागले.

१९३३ साली त्यांनी पारिजात प्रकाशन सुरू केले. त्यानंतर त्यांच्या मुलीच्या ज्योतीच्या निधनांनंतर तिच्या स्मृतीप्रित्यर्थ ४३ साली त्यांनी ‘वाङ्मय ज्योती’ ही प्रकाशन संस्था सुरू केली. दोन्ही प्रकाशन संस्थानतर्फे कथा, शब्दचित्रे, लघुनिबंध, गाणी, कादंबर्या०, विद्यार्थ्यांसाठी माहितीपर पुस्तके प्रकाशित केली गेली. मुलांसाठी पुस्तके प्रकाशित करण्याकडे त्यांचा विशेष कल होता. अध्यापन, चित्रपट निर्मिती, लॉजिंग-बोर्डिंग असे प्रकाशांनाव्यतिरिक्त इतर अनेक व्यवसाय त्यांनी केले. त्यांनी अनेक प्रकारचे लेखन केले. ‘ज्ञानपारिजात’या विज्ञानकोशाची निर्मिती हे त्यांचे विशेष उल्लेखनीय कार्य मानले जाते.

‘हृदय’ हा त्यांचा पहिला व्यक्तिचित्र संग्रह. त्यात ४ भाग आहेत. एकूण १२ व्यक्तिचित्रणे आहेत. यात व्यक्तिचित्रणाबरोबरच व्यक्तिप्रधान कथाही आहेत. १९३५ ते ५५ या काळात त्यांच्या लेखनावर त्यांच्या अध्यापन व्यवसायाचा प्रभाव होता. आदर्शवादी, बोधवादी व कौटुंबिक  पार्श्वभूमी असलेल्या ‘हृदय’मधील कथा वास्तववादी व सोज्वळ आहेत.

अमर विश्व साहित्य, (कथा), आम्ही खेडवळ माणसं (कादंबरी), उपकारी माणसे (४ खंड), गीत ज्योती (मुलांसाठी अभिनय गीते) , टॉम सायरची साहसे ( अनुवादीत कथा), मॉबी डिकचा राक्षस (अनुवादित कादंबरी) इ. चांगली पुस्तके त्यांच्या प्रकाशन संस्थेद्वारा प्रकाशित झाली आहेत.

                  ———————————————

बाळ ज. पंडित ( २४ जुलै १९२९ ते १७ सप्टेंबर २०१५ )

बाळ ज. पंडित हे क्रिकेट खेळाडू व प्रख्यात क्रिकेट समालोचक होते. वयाच्या ६-७ वर्षापासून त्यांना क्रिकेटची आवड होती. वडील, मामा आणि चुलत भाऊ यांनी त्यांना क्रिकेट खेळण्यासाठी विशेष प्रोत्साहन दिले. १९५९-६०च्या रणजी क्रिकेटमधे ते खेळले. मात्र त्यांची कारकीर्द मैदानापेक्षा मैदानाबाहेरच अधीक गाजली.

लहानपणापासून मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषांवर त्यांचे चांगले प्रभुत्व होते.  भाषाप्रभुत्व आणि क्रिकेटविषयी असणारं प्रेम यामुळे त्यांनी काही वर्तमानपत्रातून क्रिकेटविषयक लेखन सुरू केले. आकाशवाणीवरूनही त्यांनी क्रिकेटचे समालोचन सुरू केले आणि आपल्या ओघवत्या  भाषेत क्रिकेट घराघरात पोचवले. मैदानावर २० आणि मैदानाबाहेर ५० वर्षे त्यांनी क्रिकेटची सेवा केली. दीर्घकाळ समालोचन करण्याबाद्दल (४२ वर्षे) , ‘लिम्का वर्ल्ड रेकॉर्डने’ त्यांची दखल घेतलीय.

क्रीडा समीक्षक  म्हणून ५० वर्षे त्यांनी वर्तमानपत्रातून क्रिकेटविषयक लेखन केले. त्यांची ३०हून अधीक क्रीडाविषयक पुस्तके प्रकाशित आहेत. ‘पराक्रमी दौरा’ आणि ‘द लिटिल मास्टर’ या पुस्तकांना राष्ट्रीय स्तरावरचे पुरस्कार मिळाले. ‘आमने सामने’ या पुस्तकाला महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार मिळाला.  

मराठीत देवधरांनी मराठी समालोचन सुरू केले. आणि पंडितांनी ते विशेष लोकप्रिय केले. दोघांनीही क्रिकेटशी संबंधित मराठीत वेगवेगळे शब्द बनवले. शतक, षट्कार, चौकार, यष्टी, गोलंदाज, सीमापार, आपटबार इ. शब्द उदाहरण म्हणून सांगता येतील.

बाळ ज. पंडित यांनी लिहिलेली काही पुस्तके-

१. अटीतटीचे सामने, २. असे सामाने असे खेळाडू , ३. आठवणीतील व्यक्ती आणि प्रसंग, ४. लोकमान्यांचा मानसपुत्र श्रीमंत जगन्नाथ महाराज पंडित , सचिन तेंडुलकर,

२. त्यांनी सुनील गावस्कर यांनी लिहीलेल्या आयडॉल्स, सनी डेज, रन्स अँड रुईन्स या पुस्तकांचे अनुवादही केले आहेत.

आज रघुवीर सामंत आणि बाळ ज. पंडित या दोघांचा स्मृतिदिन आहे. त्या निमित्त या दोघांना सादर वंदन.? 

☆ ☆ ☆ ☆ ☆

सौ. उज्ज्वला केळकर

ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : विकिपीडिया

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ १६ सप्टेंबर – संपादकीय – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ १६ सप्टेंबर – संपादकीय – सुश्री मंजुषा सुनीत मुळे– ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

सुप्रसिद्ध  मराठी लेखक, नाटककार, पत्रकार श्री. जयवंत द्वारकानाथ दळवी यांचा आज स्मृतीदिन. ( १४ ऑगस्ट १९२५—१६ सप्टेंबर १९९४)

जयवंत दळवी यांचा जन्म गोव्यातील हडफडे गावी झाला. जवळच्या शिरोडे गावी त्यांनी पाचवीपर्यंतचे शिक्षण घेतले. नंतर ते मुंबईला आले. बालपणी त्यांच्यावर राष्ट्र सेवा दलाचे संस्कार झाले होते. श्रमदान मोहिमेतही ते उत्साहाने भाग घेत.  मॅट्रिक झाल्यावर मुंबईच्या व्ही.जे.टी.आय.मध्ये टेक्स्टाइल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा घेण्यासाठी ते आले होते. पण डिप्लोमा पूर्ण होण्याआधीच ते मुंबईच्या ‘प्रभात’ दैनिकात रुजू झाले. तेथून ते ‘लोकमान्य’ मध्ये गेले. अमेरिकन सरकारच्या मुंबई येथील माहिती खात्यात (युसिस) त्यांनी नोकरी स्वीकारली. पण लेखनासाठी पूर्ण वेळ मिळावा म्हणून वयाच्या पन्नासाव्या वर्षीच  स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली.

दळवींचे बालपण तीस-चाळीस माणसांच्या, जुन्या परंपरा प्राणपणाने जपणाऱ्या एकत्र कुटुंबात गेले. कुटुंबात विकेशा विधवा होत्या, वेडगळ व्यक्ती होत्या, वेगवेगळ्या वृत्तींची-विकारांची माणसे होती. संस्कारक्षम वयात दळवींचा संपर्क अशा माणसांशी आला. त्यावेळी पाहिलेल्या, मनावर ओरखडे उठवणाऱ्या,आयुष्यातील वेगवेगळ्या भोगांचे,अतृप्त वासनांचे, सुख-दुःखांचे दशावतार, विकार-वासनांच्या आवर्तात हेलपाटणारी, गोंधळली माणसे, या सगळ्याचे वास्तव चित्रण त्यांच्या कथा, कादंबरी, नाटक यात पदोपदी दिसून येते . 

त्यांची पहिली कथा ‘दातार मास्तर’ १९४८मध्ये ‘नवा काळ’ दैनिकात प्रसिद्ध झाली. आणि त्यानंतर त्यांची  लेखणी थांबलीच नाही. विविध साहित्य प्रकार त्यांनी समर्थपणे हाताळले. ‘गहिवर’ (१९५६), ‘एदीन’ (१९५८), ‘रुक्मिणी’ (१९६५), ‘स्पर्श’ (१९७४) आदी १५ कथासंग्रह; ‘चक्र’ (१९६३), ‘स्वगत’ (१९६८), ‘महानंदा’ (१९७०), ‘अथांग’ (१९७७), ‘अल्बम’ (१९८३) आदी २१ कादंबर्‍या; ‘संध्याछाया’ (१९७४), ‘बॅरिस्टर’ (१९७७), ‘सूर्यास्त’ (१९७८), ‘महासागर’ (१९८०), ‘पुरुष’ (१९८३), ‘नातीगोती’ (१९९१) आदी १९ नाटके दळवींनी लिहिली आणि त्यातील बहुतेक पुस्तके गाजली. ‘ लोक आणि लौकिक ’ हे त्यांनी लिहिलेले प्रवासवर्णन आणि ‘ सारे प्रवासी घडीचे ’ हे कोकणातील विलक्षण व्यक्तींचे आणि त्यांच्या जगावेगळ्या कर्तृत्वाचे, विक्षिप्तपणाचे, चित्रण करणारे, विनोदी ढंगाने लिहिलेले पुस्तक खूप वाचकप्रिय ठरले.

दळवींची ‘चक्र’ ही पहिलीच अगदी वेगळ्या विषयावरची कादंबरी. एकूणच मराठी कादंबरीच्या अनुभवक्षेत्राची कक्षा वाढविणारी आणि प्रादेशिकतेची कोंडी फोडणारी कादंबरी म्हणून ती वाखाणली गेली. मुंबईतील झोपडपट्टीमधील गलिच्छ जीवन, तिथे रहाणार्‍यांचे उघडे-नागडे आयुष्य चितारताना, बकाल परिसरात पशुतुल्य आयुष्य जगणार्‍या तेथील व्यक्तींच्या स्वप्नांचा, जीवनमूल्यांचा वेध त्यांनी घेतला आहे. त्यांना पत्रकारितेच्या काळात आलेले जिवंत अनुभव यासाठी फार उपयोगी ठरले होते हे सहज लक्षात येते. मध्यमवर्गीयांना सर्वस्वी अपरिचित असलेल्या चित्रविचित्र संघर्षाचे प्रत्ययकारी चित्रण त्यांनी या कादंबरीत केले आहे. विशेष म्हणजे, या कादंबरीतील व्यक्तिचित्रे, जी त्यातील कथेपेक्षाही महत्त्वाची आहेत, ती दळवींनी फार प्रभावीपणे उभी केली आहेत. मराठीतील एक अभूतपूर्व कादंबरी म्हणून ‘चक्र’चा उल्लेख केला जातो. 

याव्यतिरिक्त, आणखी कितीतरी कादंबऱ्या, कथा, व्यक्तिचित्रणे, आत्मचरित्र,  स्तंभलेखन, यांचा समावेश असणारी त्यांची विपुल साहित्यसंपदा प्रसिद्ध झालेली आहे. लेखन मर्यादेमुळे त्या सर्व लेखनाचा तपशील इथे देता येत नाही याची खरंच खंत वाटते. त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य हे की त्यांच्या या सर्वच लेखनात सहजपणा आहे, वाचकांना खिळवून ठेवण्याची ताकद आहे. ‘. ‘ठणठणपाळ’ हे टोपणनाव धारण करून ‘ललित’ मासिकात त्यांनी ‘घटका गेली पळे गेली’ हे सदर वीस वर्षे चालविले. त्यातून अत्यंत मार्मिक आणि तरल विनोदाचा वस्तुपाठच त्यांनी जाणत्या वाचकांसमोर ठेवला. एकंदरीतच मराठी वाङ्मयव्यवहारातील अनिष्ट, अर्थशून्य आणि वाङ्मयविकासाला मारक ठरणार्‍या अनेकविध प्रवृत्ती त्यांच्या लेखनातून त्यांनी सहजपणे लोकांसमोर आणल्या. गंभीर कथालेखनाबरोबर दळवींनी विनोदी लेख व कथाही लिहिल्या. फॅन्टसीच्या दिशेने जाणार्‍या विक्षिप्त कथा लिहिल्या. मात्र ‘विनोदी लेखक’ म्हणून आपल्यावर शिक्का पडावा, असे त्यांना कधीच वाटले नाही. सर्वसाधारणपणे लेखन गंभीर हवे आणि अधूनमधून विनोद यायला हवा हे पथ्य त्यांनी नेहमीच पाळले. प्रत्यक्षात मात्र ते सदैव प्रसन्न, विनोदी, मिश्किल बोलणारे, चेष्टा करणारे, दुसर्‍यांच्या विनोदाला खळखळून हसून दाद देणारे असे होते. पण ते माणसांत रमणारे असले, तरी वृत्तीने एकाकी होते. 

 ‘ठणठणपाळ’ विषयी ज्ञानपीठकार विंदा करंदीकर यांनी म्हटले आहे की, “ ठणठणपाळच्या भूमिकेतून दळवींनी केलेल्या लिखाणाला व कार्याला तोड नाही. इतकी जागरूकता, इतके शहाणपण, इतका जिव्हाळा आणि इतका परखडपणा मराठी समीक्षात्मक विभागाला अजूनपर्यंत भेटलेला नव्हता.”  

दळवी चतुरस्र प्रतिभेचे लेखक होते. ‘इमोशन अ‍ॅन्ड इमॅजिनेशन अ‍ॅन्ड देअर प्लेस इन लिटरेचर’ या विषयावर संशोधन करून त्यांनी एम.ए.साठी प्रबंधही सादर केला होता. ‘युनायटेड स्टेट्स इन्फर्मेशन सर्व्हिसेस’ (यू.एस.आय.एस.) मध्ये रुजू झाल्यानंतर, इंग्लिश साहित्य भारतीय भाषांमध्ये उपलब्ध व्हावे यासाठी त्या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी खूप प्रयत्‍न केले. मराठी साहित्याला त्यांनी दिलेले योगदान खरोखरच फार महत्त्वाचे आहे. 

महाराष्ट्र शासनाचे, नाट्य परिषदेचे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले. पण गर्दीपासून ते कायम दूर राहिले. सार्वजनिक सभांमध्ये त्यांनी कधीही सक्रिय भाग घेतला नाही. सभा संमेलने टाळली. ‘अखिल भारतीय साहित्य संमेलना’चे अध्यक्षपदही  त्यांनी नाकारले. 

त्यांच्या लिखाणावरून काही चित्रपट कथा / पटकथा, आणि एकांकिकाही लिहिल्या गेल्या आहेत. तसेच त्यांच्या साहित्यावर भाष्य करणारी “ दु:खाची स्वगते “ ( त्यांच्या १७ कादंबऱ्यांच्या अभ्यासावर आधारित ), “ पत्ररूप दळवी,” “बेस्ट ऑफ जयवंत दळवी “, अशासारखी काही पुस्तकेही लिहिली गेली आहेत. 

मॅजेस्टिक प्रकाशनातर्फे दरवर्षी उत्कृष्ट साहित्यकृतीसाठी  “जयवंत दळवी स्मृती पुरस्कार“ दिला जातो. 

असे चतुरस्त्र साहित्यिक श्री. जयवंत दळवी यांना त्यांच्या आजच्या स्मृतिदिनी भावपूर्ण श्रद्धांजली.🙏

☆☆☆☆☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ :साहित्य साधना – कराड शताब्दी दैनंदिनी, गुगल, विकिपीडिया

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈




ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ १५ सप्टेंबर – संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? ई-अभिव्यक्ती – संवाद ☆ १५ सप्टेंबर – संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित – ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

गंगाधर गोपाळ गाडगीळ

गंगाधर गाडगीळ हे मराठीतील ख्यातनाम अर्थशास्त्रज्ञ, समीक्षक, कादंबरीकार व प्रामुख्याने कथाकार म्हणून प्रसिद्ध आहेत. मराठी कथेला नवे रूप देण्यात, तिची नव्याने मांडणी करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. म्हणूनच त्यांना मराठी नवकथेचे अध्वर्यु म्हटले जाते.

त्यांचे शालेय शिक्षण गिरगाव, मुंबई येथे झाले. विल्सन महाविद्यालयातून त्यांनी अर्थशास्त्र, राज्यशास्त्र व इतिहास या विषयात एम्. ए. केले. सुरूवातीला त्यांनी किकाभाई प्रेमचंद महाविद्यालय, सुरत येथे अध्यापनाचे काम सुरू केले. नंतर मुंबईतील पोद्दार, सिडनेहॅम व रूपारेल या महाविद्यालयांत प्राध्यापक म्हणून काम केले. नरसी मोनाजी काॅमर्स इकाॅ. महाविद्यालयाचे ते प्राचार्य होते. त्यानंतर त्यानी आपटे उद्योग समूह व वालचंद उद्योग समूह येथे आर्थिक सल्लागार म्हणून काम केले.

एकीकडे अर्थशास्त्राशी संबंधित अशी विविध पदे भूषवत असताना त्यांची साहित्य सेवाही चालू होती. ‘प्रिया आणि मांजर’ ही त्यांची पहिली कथा. ती 1941 साली वाड्मयशोभा मासिकातून छापून आली. याच मासिकातून 1944 साली ‘बाई शाळा सोडून जातात’ ही दुसरी कथा प्रसिद्ध झाली व ती खूप गाजली. पुढे 1946 मध्ये त्यांचा ‘मानसचित्रे’ हा पहिला कथा संग्रह प्रकाशित झाला.

त्यांच्या साहित्यिक कारकिर्दीत त्यांनी अनेक पदे भूषवली. 1955 साली पंढरपूरच्या साहित्य संमेलनात कथा शाखेचे ते अध्यक्ष होते. 1981 साली रायपूर(म. प्र. ) येथे झालेल्या अ. भा. साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. 1983 साली च्या मुंबईत भरलेल्या मराठी विनोद साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते . मुंबई मराठी साहित्य संघ, मराठी साहित्य महामंडळ या संस्थांचे ते अध्यक्ष होते. तसेच साहित्य अकादमीच्या कार्यकारी मंडळाचे ते सदस्य होते.

मुंबईच्या ग्राहक पंचायतीत ते सक्रीय सहभागी होतेच, पण या संस्थेचे ते 25 वर्षे अध्यक्षही होते. याशिवाय1957 मध्ये राॅकफेलर फाउंडेशनची त्यांना शिष्यवृत्तीही मिळाली होती. त्यानिमित्ताने  हार्वर्ड व स्टॅनफोर्ड विद्यापिठात एक वर्ष वास्तव्य केले होते.

गंगाधर गाडगीळ यांचे साहित्य विपुल प्रमाणात आहे.

त्यातील काही निवडक साहित्य:

कथासंग्रह

अमृत, आठवण, ऊन्ह आणि पाऊस, ओले ऊन्ह, कडू आणि गोड, मानसचित्रे, काजवा, गुणाकार, तलावातले चांदणे, पाळणा, भिरभिरे इत्यादी.

कादंबरी

गंधर्वयुग, दुर्दम्य, प्रारंभ, लिलीचे फूल इत्यादी

प्रवासवर्णन

गोपुरांच्या प्रदेशात, नायगाराचा नादब्रह्म, सातासमुद्रापलीकडे, हिममय अलास्का, इ.

नाटके

आम्ही आपले थोर पुरूष होणार(बालनाट्य), ज्योत्स्ना आणि ज्योती, रहस्य आणि तरूणी, वेड्यांचा चौकोन इ.

समीक्षा ग्रंथ

आजकालचे साहित्यिक खडक आणि पाणी, पाण्यावरची अक्षरे, साहित्याचे मानदंड इ.

ललित

अशा चतुर बायका, आम्ही आपले ढढ्ढोपंत, गरूडाचा उतरला गर्व, निवडक फिरक्या, बंडूचं गुपचूप इ.

आत्मचरित्र

आठवणी च्या गंधरेखा, एका मुंगीचे महाभारत.

प्राप्त  पुरस्कार:

एका मुंगीचे महाभारत ला 1996 चा साहित्य अकादमी पुरस्कार.

जनस्थान पुरस्कार.

श्री. बाळकृष्ण कवठेकर यांनी गंगाधर गाडगीळ यांच्या साहित्य कारकिर्दीचे नेमके वर्णन केले आहे. ते म्हणतात- “गाडगीळांनी विविध प्रकारची विपुल साहित्य निर्मिती केली असली तरी ते प्रामुख्याने ओळखले जातात ते मराठी नवकथेच्या निर्मात्यांपैकी एक म्हणून!मराठी नवकवितेच्या संदर्भात मर्ढेकरांचे जे स्थान आहे, तेच नवकथेच्या संदर्भात गाडगीळांचे आहे. म्हणूनच मराठी नवकथा घडवली ती मुख्यतः गाडगीळानीच. इतरांनी त्याना हातभार लावला  असे म्हणणेच वस्तुस्थितीला धरून होईल. किंबहुना असेही म्हणता येईल की नवकथाकारांमधील नवता टिकून राहिली ती बहुतांश गाडगीळांमुळेच !”

अशा या चतुरस्त्र साहित्यिकाचे 15सप्टेंबर2008 मध्ये वयाच्या 85 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!. 🙏

☆☆☆☆☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ: विकिपीडिया, दै. लोकसत्ता.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

 




ई-अभिव्यक्ति – संवाद ☆१४ सप्टेंबर – संपादकीय – सौ. गौरी गाडेकर ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सौ. गौरी गाडेकर

? ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ १४ सप्टेंबर – संपादकीय – सौ. गौरी गाडेकर,  ई–अभिव्यक्ती (मराठी) ?

हिंदी दिवस

14 सप्टेंबर 1953पासून दर वर्षी 14 सप्टेंबर हा दिवस ‘हिंदी दिवस’ म्हणून साजरा केला जातो.

1918मध्ये झालेल्या हिंदी साहित्य संमेलनात ‘हिंदी ही जनमानसाची भाषा असल्यामुळे तिला राष्ट्रभाषा बनवावी’, असे महात्मा गांधीजींनी म्हटले होते.

पुढे भारत स्वतंत्र झाल्यावर 14 सप्टेंबर 1949 रोजी भारताच्या संविधानसभेने देवनागरी लिपीत लिहिल्या जाणाऱ्या हिंदी भाषेला भारताची राष्ट्रभाषा म्हणून जाहीर केले. इंग्रजीऐवजी हिंदीला राष्ट्रभाषेचा दर्जा देणे हे आपल्या स्वातंत्र्याचे, अस्मितेचे प्रतीक होते. राष्ट्रभाषा हिंदी, लिपी देवनागरी, मात्र अंक आंतरराष्ट्रीय रूपात असावेत, असे घोषित केले गेले.

पण या प्रस्तावाला अहिंदीभाषिक राज्यांतील जनतेने कसून विरोध केला. त्यामुळे इंग्रजीचे स्थान तसेच राहिले.

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर राष्ट्रभाषा म्हणून हिंदीचे महत्त्व प्रस्थापित करण्यासाठी काका कालेलकर, हजारीप्रसाद द्विवेदी, सेठ गोविंददास, व्यौहार राजेंद्रसिंह यांनी अथक परिश्रम केले.

बोलणाऱ्या व्यक्तींची संख्या बघितली, तर अख्ख्या जगात इंग्रजी व चिनीनंतर हिंदी भाषा बोलणाऱ्यांचा तिसरा नंबर लागतो. पण चांगल्या प्रकारे हिंदी बोलणे, लिहिणे, वाचणे जमणाऱ्या व्यक्तींची संख्या त्या मानाने कमी आहे व ती आणखी कमी होत जात आहे. व्यवहारातही हिंदी शब्दांची जागा इंग्रजी शब्द घेत आहेत. त्यामुळे हिंदी भाषा लुप्त होण्याच्या शक्यतेकडे वेगाने जात आहे. त्यामुळे हिंदी भाषेप्रती असणाऱ्या आपल्या कर्तव्याची आठवण असावी, म्हणून हिंदी दिवस साजरा करणे महत्वाचे आहे. जागतिक पातळीवरील आकडेवारी पाहायची झाली, तर योगाला 177 देशांचे समर्थन मिळाले ;पण हिंदीला 129 देशांचे समर्थन मिळवण्यात आपण अजूनही यशस्वी झालो नाही.

हिंदी भाषेचे महत्त्व व तिच्या वापराची नितांत आवश्यकता लोकांच्या मनावर बिंबवण्यासाठी हिंदी दिवस साजरा केला जातो.

या दिवशी हिंदीच्या प्रचारासाठी विविध उपक्रम राबवले जातात. हिंदी निबंधलेखन, वक्तृत्वस्पर्धा,हिंदी टंकलेखन स्पर्धा आयोजित केल्या जातात.

या दिवशी सरकारी कार्यालयांत इंग्रजीऐवजी हिंदीचा वापर करण्याचा प्रयत्न करतात.

हिंदीच्या विकासाचं काम करणाऱ्या व्यक्तींना, तसेच हिंदीच्या प्रचारासाठी विशेष योगदान देणाऱ्या व्यक्तीला पुरस्कार दिला जातो.

तांत्रिक वा वैज्ञानिक विषयांवर हिंदीत लिहिणाऱ्या व्यक्तींमधून 13 जणांना (पहिला, दुसरा, तिसरा व 10 उत्तेजनार्थ) राजभाषा गौरव पुरस्कार दिला जातो. तांत्रिकी व विज्ञानक्षेत्रात हिंदी भाषेला पुढे नेणे, हे या पुरस्काराचे उद्दिष्ट आहे.

सरकारी कामकाजात हिंदीचा उपयोग वाढवण्यासाठी समिती, विभाग, मंडळानी हिंदीत केलेल्या श्रेष्ठ कार्यासाठी राजभाषा कीर्ती पुरस्कार प्रदान केला जातो.

आजच्या या हिंदी दिवसाच्या निमित्ताने आपणही हिंदी भाषेच्या विकासकार्यात योगदान देण्याची प्रतिज्ञा करूया.

सौ. गौरी गाडेकर

ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : विकीपीडिया

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈




ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ १२ सप्टेंबर – संपादकीय – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ १२ सप्टेंबर – संपादकीय – सुश्री मंजुषा सुनीत मुळे– ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

श्री. विनायक लक्ष्मण भावे

मराठी लेखक, प्राचीन मराठी साहित्याचे संशोधक व इतिहासकार म्हणून प्रसिद्ध असलेले श्री. विनायक लक्ष्मण भावे यांचा आज स्मृतिदिन.  (६ नोव्हेंबर १८७१; – १२ सप्टेंबर १९२६). 

श्री भावे यांचे बालपण आणि शालेय शिक्षण ठाणे येथे झाले होते. शाळेत असताना जनार्दन बाळाजी मोडक या त्यांच्या शिक्षकांमुळे त्यांना प्राचीन मराठी काव्याची गोडी लागली आणि  त्यांनी जुन्या कवितासंग्रहांचा संग्रह करायला सुरुवात केली. मग याच छंदामुळे प्रेरित होऊन श्री. भावे यांनी १ जून १८९३ रोजी, म्हणजे वयाच्या अवघ्या बावीसाव्या वर्षी, ठाणे शहरातल्या मराठी ग्रंथ संग्रहालयाची स्थापना केली. इ.स. १८८७ मध्ये, म्हणजे ते मॅट्रिकच्या वर्गात असतांना त्यांच्या वडिलांनी त्यांना इतिहासाचे पुस्तक विकत आणून दिले नाही, हेही या संग्रहालयाच्या स्थापनेसाठी त्यांना उद्युक्त करणारे एक महत्वाचे कारण ठरले होते.  

सन १८९५ मध्ये भावे मुंबईतून बी.एस्‌.सी. झाले. नंतर त्यांनी अनेक वर्षे मिठागरे चालवण्याचा व्यवसाय केला.

इ.स. १८९८ पासून वि.ल.भावे यांनी खऱ्या अर्थाने सार्वजनिकरित्या लेखनास सुरुवात केली आणि त्यांचा वाङ्‌मयाच्या इतिहासासंबंधीचा ९८ पानी निबंध, ‘ ग्रंथमाला ’ या मासिकातून १८९८-१८९९ या कालावधीत प्रकाशित झाला. या निबंधात पेशवाई – अखेरपर्यंतचा मराठी वाङ्‌मयाचा इतिहास त्यांनी थोडक्यात सांगितला आहे.

१९०३ साली त्यांनी ‘ महाराष्ट्र कवी ‘ हे मासिक काढले आणि ‘ उत्तम संपादक ‘ अशी नवी ओळख त्यांना मिळाली.  त्या मासिकातून भावे यांनी दासोपंत, सामराज, नागेश आदी कवींचे जुने ग्रंथ संशोधित स्वरूपात प्रसिद्ध केले. काही कारणाने १९०७ साली हे मासिक बंद पडले. पण त्यानंतर महानुभावांच्या सांकेतिक लेखनाची ( म्हणजे सकळ आणि सुंदरी या गुप्त लिप्यांची ) किल्ली हस्तगत करून त्यांनी महानुभावांच्या पोथ्या बाळबोध लिपीत प्रकाशित केल्या. 

याच विषयासंदर्भातला  ‘महाराष्ट्र सारस्वत‘ हा त्यांचा ग्रंथ अतिशय लोकप्रिय झाला होता. या ग्रंथाच्या दुसऱ्या आवृत्तीत (इ.स.१९१९) वि.ल.भावे यांनी वाचकांना  ‘महानुभाव  पंथ आणि त्यांचे वाङ्‌मय‘ यांचा सविस्तर परिचय करून दिला. महाराष्ट्र सारस्वत हा ग्रंथ इतका गाजला की ते महाराष्ट्र सारस्वतकार या उपाधीनेच ओळखले जाऊ लागले. 

ऐतिहासिक कागदपत्रांच्या प्रकाशनासाठी  त्यांनी ‘ मराठी दप्तर ’ नावाची स्वतंत्र संशोधन संस्था काढली. त्या संस्थेतर्फे त्यांनी १९१७ व १९२२ साली दोन ‘रुमाल’ प्रसिद्ध केले. तसेच अज्ञानदास यांच्या अफजलखानाच्या पोवाड्यातील ऐतिहासिक प्रसंगावर एक ५३ पानी निबंध लिहून तो प्रकाशित केला. त्यांनी ‘ विद्यमान ’ नावाचे मासिकही काढले होते. 

त्यांनी नेपोलियनचे चरित्र प्रथमच मराठीत आणले ही विशेषत्वाने सांगण्यासारखी आणखी एक गोष्ट. 

सारस्वतकार वि.ल. भावे यांचे प्रकाशित साहित्य—-

  • अज्ञानदासाचा अफजलखान वधावरचा पोवाडा (१९२४ मध्ये संपादित)
  • चक्रवर्ती नेपोलियन (चरित्र-१९२१-२२)
  • तुकारामबुवांचा अस्सल गाथा (भाग १ला, १९१९; भाग २रा, १९२०)
  • दासोपंतांचे गीतार्णव (संशोधित आवृत्ती)
  • नागेश कवींचे सीतास्वयंवर (संशोधित आवृत्ती)
  • महानुभावीय महाराष्ट्र ग्रंथावली-कविकाव्यसूची (१९२४)
  • महाराष्ट्र सारस्वत
  • वच्छाहरण (महानुभावीय काव्य, संपादन १९२४)
  • शिशुपालवध(महानुभावीय काव्य, संपादन १९२६)
  • मराठी दफ्तर, रुमाल पहिला, लेखांक १ – श्रीमंत महाराज भोसले यांची बखर (शेवगावकर बखर)
  • मराठी दफ्तर, रुमाल दुसरा , लेखांक १ ते ४
  • श्री शिवाजी महाराजांचा पहिला पराक्रम (५३ पृष्ठांचा निबंध)
  • सामराजाचेरुक्मिणीस्वयंवर (संशोधित आवृत्ती)

सारस्वतकार श्री. वि. ल. भावे यांना आजच्या त्यांच्या स्मृतिदिनी विनम्र आदरांजली.🙏

☆☆☆☆☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ :साहित्य साधना – कराड शताब्दी दैनंदिनी, गुगल, विकिपीडिया

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈




ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ ८ ऑगस्ट – संपादकीय – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ ८ सप्टेंबर – संपादकीय – सुश्री मंजुषा सुनीत मुळे– ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

बगळ्यांची माळ फुले अजुनी अंबरात — किंवा — त्या तरुतळी विसरले गीत — तसेच —

राहिले ओठातल्या ओठात वेडे शब्द माझे — किंवा — आज राणी पूर्वीची ती प्रीत तू मागू नको —

– अशी एकाहून एक सुंदर, तरल भावगीते, आणि हळुवार भावनांनी बहरलेली प्रेमगीते लिहिणारे प्रसिद्ध मराठी कवी आणि गीतकार श्री. वामन रामराव तथा वा. रा. कांत यांचा आज स्मृतिदिन.  (ऑक्टोबर ६, १९१३ – सप्टेंबर ८, १९९१) 

श्री. कांत यांचा जन्म नांदेड येथे झाला. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण नांदेड येथे झाले. इंटरपर्यंतचे शिक्षण हैदराबाद येथे झाले. पण त्यानंतर त्यांना शिक्षण अर्धवट सोडावे लागले. अर्थात त्यांच्या काव्यप्रतिभेमध्ये त्यामुळे काहीच फरक पडला नाही आणि उणीव तर अजिबातच राहिली नाही असे आवर्जून सांगायला हवे.  

साधारण १९६० आणि ७० च्या दशकात मराठीमध्ये “ भावगीत “ हा भावप्रधान काव्यरचनेचा प्रकार– जो खरंतर खूप पूर्वीपासूनच ‘ भावगीत ‘ हे नामानिधान न लावता लिहिला जात होता – तो रसिकांपर्यंत विशेषत्वाने पोहोचला, रुळला, लोकप्रिय झाला, आणि रसिकांच्या मनात घट्ट रुजलाही. श्री. वा.रा.कांत हे त्यावेळच्या अग्रगण्य भावगीतकारांपैकी एक अग्रणी. अतिशय आशयगर्भ आणि हळुवार शब्दरचना असणाऱ्या काव्यरचना करणारे अलौकिक प्रतिभावंत, आणि लोकप्रिय कवी आणि गीतकार ही त्यांची अगदी ठळक ओळख सुरुवातीपासूनच निर्माण झाली,आणि आता रसिकांच्या मनात ती कायमची ठसली गेली आहे.   

‘विहंगमाला’ या नियतकालिकाचे संपादक (१९२८) तसेच विहंग प्रेसचे व्यवस्थापक म्हणून त्यांनी काही काळ काम केले होते.  त्यानंतर निजाम सरकारच्या शेतकी खात्यात लिपिक म्हणून नोकरी केली होती. (१९३३-१९४५). नंतर त्यांनी निजाम सरकारच्याच आकाशवाणी हैदराबाद व औरंगाबाद केंद्रांत मराठी विभागप्रमुख म्हणून जवळपास पंधरा वर्षे कार्यभार सांभाळला. (१९४५- १९६०). त्यानंतर १९६०-१९७० अशी दहा वर्षे भारतीय आकाशवाणीच्या विविध केंद्रांवर मराठी विभागप्रमुख म्हणून त्यांनी काम पाहिले. शेवटी आकाशवाणीच्या मुंबई केंद्रातून ते सेवानिवृत्त झाले.  

श्री. कांत यांचे प्रकाशित साहित्य —-

काव्यसंग्रह 

दोनुली, पहाटतारा, बगळ्यांची माळ, मरणगंध (नाट्यकाव्य), मावळते शब्द, रुद्रवीणा, वाजली विजेची टाळी, वेलांटी, शततारका, सहज लिहिता लिहिता, फटत्कार, मावळते शब्द 

कविता, भावगीते याबरोबरच त्यांनी नाटयलेखन, अनुवाद, समीक्षा , अशाप्रकारचे गद्य लेखनही केले होते. 

‘अभिजात‘, आणि ‘रसाळ वामन‘ अशा टोपण नावांनीही त्यांनी काही लिखाण केलेले होते. 

श्री. कांत यांना पुढील पुरस्कार प्राप्त झाले होते —–

१९६२-६३ ‘वेलांटी ‘ या काव्यसंग्रहास महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार

१९७७-७८ ‘मरणगंध ‘ या नाट्यकाव्यास महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार

१९७९-८० ‘ दोनुली’ या काव्यसंग्रहास महाराष्ट्र शासनाचा ‘केशवसुत ‘ पुरस्कार

१९८९-९० ‘मावळते शब्द’ या काव्यसंग्रहास महाराष्ट्र शासनाचा ‘केशवसुत’ पुरस्कार 

तसेच त्यांना पुढील सन्मान देऊन गौरविण्यात आले होते —-

१९८८ महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे यांच्यातर्फे उत्कृष्ट वाङ्मयसेवेसाठी सन्मान

१९८९ महाराष्ट्र साहित्य परिषद, हैदराबाद यांच्यातर्फे उत्कृष्ट वाङ्मयसेवेसाठी सन्मान

१९८९ महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळातर्फे प्रदीर्घ वाङ्मयसेवेसाठी गौरववृत्ती देऊन सन्मान

वा.रा. कांत यांचे एक छोटेखानी चरित्र -” कविवर्य वा.रा.कांत “ – या नावाने कृ.मु. उजळंबकर यांनी लिहिले आहे आणि कालिंदी प्रकाशनाने ते प्रसिद्ध केले आहे.

माझी उन्हे मावळली आहेत …. माझी फुले कोमेजली आहेत 

कालचा प्रकाश, कालचा सुवास…. मात्रा वेलांटीत शोधत आहे 

शंभर वर्षांनंतर कोण माझी कविता वाचीत आहे ? …… 

— अशा भावना जरी त्यांनी स्वतः त्यांच्या अखेरच्या दिवसात व्यक्त केल्या असल्या, तरी खरा मराठी रसिक मात्र तो स्वतः हयात असेपर्यंत श्री. कांत यांची मनाला थेट भिडणारी भावकाव्ये विसरणे अशक्य आहे यात शंका नाही. 

श्री वा. रा. कांत यांना आजच्या त्यांच्या स्मृतिदिनी अतिशय भावपूर्ण आदरांजली.🙏

☆☆☆☆☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ :साहित्य साधना – कराड शताब्दी दैनंदिनी, गुगल, विकिपीडिया

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈




ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ ५ सप्टेंबर – संपादकीय – सौ. उज्ज्वला केळकर ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? ई-अभिव्यक्ती – संवाद ☆ ५ ऑगस्ट -संपादकीय – सौ. उज्ज्वला केळकर – ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

रॉय किणीकर म्हणजेच रघुनाथ रामचंद्र किणीकर॰ यांनी मराठीत कविता नाटके, एकांकिका, कथा, कादंबरी, बालसाहित्य लिहिले. साहित्याचे अनुवादही केले. ते पत्रकार होते. त्यांचा जन्म १९०७ सालचा. त्यांचे बरेचसे वास्तव्य कर्नाटकातील गुलबुर्गा इथे झाले. पुढचा काही काळ ते पुणे, औरंगाबाद इथे राहिले.

औरंगाबादहून प्रसिद्ध होणार्या  दै. अजिंठाच्या रविवारच्या आवृत्तीचे ते संपादक होते. रविवार पुरवणीत ते ललित लेखन करत. रात्र आणि उत्तररात्र हे त्यांचे कवितासंग्रह विशेष गाजले. शैलीबद्ध रुबाया ही त्यांची खासियत होती.

त्यांनी काही नाटकातूनही कामे केली होती. ‘ये गं ये गं विठाबाई हे त्यांचे नाटक गाजले. ते सहाय्यक नाट्यदिग्दर्शकही होते.

रॉय किणीकर यांचे प्रकाशित साहित्य –

नाटके – किती रंगला खेळ, खजिन्याची विहीर, ये गं ये गं विठाबाई

एकांकिका – मंगळसूत्र, देव्हारा, साऊंड ट्रॅक

कादंबरी – कोणार्क

कथा – आंधळे रंग, पांगळ्या रेषा

निबंध – शिल्पायन

अनुवादित – इथे जगण्याची सक्ती आहे, एकदा अशीच रात्र येते, दर्यावर्दी कोलंबस

रॉय किणीकर यांच्या ‘ये गं ये गं विठाबाई’ या नाटकाला महाराष्ट्र सरकारचे ६३ सालचे नाट्यलेखनासाठीचे परितोषिक मिळाले.

रॉय किणीकर माणूस आणि साहित्य हे त्यांच्यावरील पुस्तक, त्यांचे चिरंजीव अनिल किणीकर यांनी लिहिले.

आज त्यांचा स्मृतिदिन. त्यानिमित्त त्यांच्या प्रतिभेला प्रणाम. ? 

☆ ☆ ☆ ☆ ☆

सौ. उज्ज्वला केळकर

ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : साहित्य साधना – कराड शताब्दी दैनंदिनी, गुगल, विकिपीडिया

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ ३ सप्टेंबर – संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? ई-अभिव्यक्ती – संवाद ☆ ३ सप्टेंबर – संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित – ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

माधव काटदरे:

माधव काटदरे हे निसर्गकवी म्हणून ओळखले जात असले तरी त्यांनी अनेक ऐतिहासिक व व्यक्तीपर काव्यलेखन केले आहे. काही शिशुगीते व विनोदी कविताही त्यांनी रचल्या आहेत.

छ. शिवाजीमहाराज, शाहूमहाराज, सवाई माधवराव, मस्तानी हे त्यांच्या काव्याचे विषय होते. पानपतचा सूड, तारापूरचा रणसंग्राम, जिवबादादा बक्षी या त्यांच्या काही ऐतिहासिक कविता. याशिवाय गोविंदाग्रज, ना. वा. टिळक, लकवी, कवी विनायक यांवरही त्यांनी कविता लिहिल्या होत्या. रवींद्रनाथ टागोर यांच्या काही कवितांचा अनुवादही त्यांनी केला होता.

गीतमाधव, धृवावरील फुले, फेकलेली फुले आणि माधवांची कविता हे त्यांचे काव्यसंग्रह.

‘हिरवे तळकोकण’ या दीर्घ, निसर्ग कवितेमुळे त्यांना खूप प्रसिद्धी मिळाली.

तीन सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठावनला त्यांचे निधन झाले. त्यांच्या स्मृतीस अभिवादन. 🙏

☆☆☆☆☆

अनंत हरी गद्रे

पत्रकरिता, नाटिकालेखन, जाहिरातलेखन, समतेचा पुरस्कार व त्याप्रमाणे आचरण अशा विविध पैलूंनी नटलेले व्यक्तिमत्व म्हणजे अनंत हरी गद्रे. त्यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील देवरूखचा. पुणे येथे शिक्षण पूर्ण केले. रा. ग. गडकरी व श्री. म. माटे हे प्रसिद्ध साहित्यिक त्यांचे सहाध्यायी   होते. त्यांना अध्यात्मिक ज्ञानाची ओढही होती. किर्तनाच्या माध्यमातून ते  महापुरूषांवर आख्याने देत.

ज्या काळात दीर्घ काळ चालणारी नाटके लिहिली जात व बघितली जात, त्या काळात त्यांनी दीड, दोन, तीन तासाच्या नाटिका लिहून नाटकाला सुटसुटीत स्वरूप प्राप्त करून दिले. प्रेमदेवता हे त्यांचे पहिले नाटक 1930 ला आले व लोकांनी उचलून धरले. आद्य नाटिका लेखक असा त्यांचा गौरव झाला.

त्यांचे भाषेवर प्रभुत्व होते. वाक्प्रचारातंचे भांडारच त्यांच्या कडे होते. शब्दांवर हुकूमत होती. या सर्वाचा उपयोग करून घेऊन त्यांनी ग्राहकाला जिंकून घेतील अशा जाहिराती करण्यास सुरूवात केली. अनेक हिंदी व मराठी नाट्य व चित्रपट निर्मात्यानी त्याचा उपयोग करून घेतल्या. त्यांच्या जाहिरातीचे वेगळेपण व कौशल्य यामुळे लोक त्यांना जाहिरात जनार्दन म्हणू लागले.

लो. टिळक आणि अच्युतराव कोल्हटकर यांना आदर्श मानून त्यांनी पत्रकारिता सुरू केली. कोल्हटकरांच्या ‘संदेश’ ची जबाबदारी त्यांनी उचलली. चार ओळींची बातमी न देता, प्रसंगाचे   वर्णन करून बातमी देण्याच्या पद्धतीमुळे त्यांच्या बातम्यातील वेगळेपण लोकांना जाणवू लागले. पुढे मौज साप्ताहिकातील त्यांची संपादकीयेही लोकप्रिय होऊ लागली. 1934मध्ये त्यांनी ‘निर्भिड’ हे साप्ताहिक सुरू केले. त्यातून ते सामाजिक समतेचा पुरस्कार करू लागले. स्पृश्यास्पृश्य, केशवपन यासारख्या विषयांना विरोध करून लिहू लागले. समतेसाठी सत्यनारायण सुरू करून अनिष्ट प्रथांना कृतीतून विरोध केला. या चळवळीत त्यांना र. धों. कर्वे, सावरकर, सेनापती बापट, शंकराचार्य, डाॅ. कुर्तकोटी या सारख्यांचा पाठींबा मिळाला. प. सत्यनारायणाच्या प्रसादासाठी ते सर्वांना परवडणारी झुणकाभाकर प्रसाद म्हणून वाटू लागले. अस्पृश्य समजल्या जाणा-या लोकांच्या पायाचे तिर्थ प्राशन करू लागले. झुणकाभाकर चळवळींचे ते जनक ठरले.

साहित्य संपदा:

नाटिका: आई, कुमारी, पूर्ण स्वातंत्र्य, घटस्फ़ोट, पुणेरी जोडा, प्रेमदेवता इ.

नाटक: कर्दनकाळ, पाहुणा, मूर्तिमंत सैतान, स्वराज्यसुंदरी इ.

सन्मान:

मराठी नाट्यसंमेलन, मुंबई

चे 1930 साली अध्यक्षपद.

शंकराचार्यांनी ‘समतानंद’ ही उपाधी दिली.

पुरस्कार: मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे समतानंद अ. ह. गद्रे पुरस्कार दिला जातो. तो आतापर्यंत अनेक नामवंताना मिळाला आहे.

वयाच्या 77व्या वर्षी 1967 मध्ये त्यांचे निधन झाले. आज त्यांचा स्मृतीदिन.

या चतुरस्त्र साहित्यिकास विनम्र अभिवादन!🙏

☆☆☆☆☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ :विकिपीडिया.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈