मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ ओवी…. ☆ श्री तुकाराम दादा पाटील

श्री तुकाराम दादा पाटील

 ☆ कवितेचा उत्सव ☆ ओवी…. ☆ श्री तुकाराम दादा पाटील ☆ 

जगायचे तर आनंदाने जगणे सुंदर आहे

भवसागर हा तरण्यासाठी म्हणती दुर्धर आहे

 

कर्म धर्म तर गोंदण होते जन्मासोबत भाळी

जगणे मरणे याच्या मधले जीवन अंतर आहे

 

सुरुवातीचे परावलंबन सरते उरते काही

कर्म चांगले देते किर्ती उरणे नंतर आहे

 

परावलंबन सरते तेव्हा स्वावलंबनी व्हावे

निसर्गातली अदभुत शक्ती इथे निरंतर आहे

 

विशाल जगती नवीनतेची नवी योजना मांडा

जग झुलवाया हाती तुमच्या मोठा अवसर आहे

 

प्रेम आंधळे नका म्हणू ना ते तर डोळस आहे

सुखी व्हायचे दोघा वरती सगळे निर्भर आहे

 

लळा जिव्हाळा प्रेम वाढवा माणुसकीचे नाते

तुमच्यासाठी हे जग दुसरे मायेचे घर आहे

 

दु:ख दळायला बसताना ही गीत सुखाचे गावे

संसाराची होते ओवी हेच बरोबर आहे

 

©  श्री तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ रंजना जी यांचे साहित्य # 62 – सारे सुखाचे सोबती ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे

श्रीमती रंजना मधुकरराव लसणे 

☆ रंजना जी यांचे साहित्य # 62 – सारे सुखाचे सोबती ☆

काठी सवे देते राया

हात तुज सावराया।

बेइमान दुनियेत

आज नको बावराया।

 

थकलेले गात्र सारे

भरे कापरे देहाला।

अनवाणी पावलांस

नसे अंत चटक्याला।

 

तनासवे मन लाही

आटलेली जगी ओल।

आर्त घायाळ मनाची

जखमही किती खोल।

 

मारा ऊन वाऱ्याचा रे।

जीर्ण वस्त्राला सोसेना।

थैलीतल्या संसाराला

जागा हक्काची दिसेना।

 

कृशकाय क्षीण दृष्टी

वणवाच भासे सृष्टी।

निराधार जीवनात

भंगलेली स्वप्नवृष्टी।

 

वेड्या मनास कळेना

धावे मृगजळा पाठी।

सारे सुखाचे सोबती

दुर्लभ त्या भेटीगाठी।

 

©  रंजना मधुकर लसणे

आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली

9960128105

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ शांतादुर्गा.. ☆ सौ. शशी नाईक-नाडकर्णी

सौ. शशी नाईक-नाडकर्णी

☆ कवितेचा उत्सव ? शांतादुर्गा.. ? सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆ 

शांतादुर्गा पाठीराखी आई

हाकेसरशी धावून  येई

संकट दूर पळूनी जाई

शांतादुर्गा तीच माझी आई !

 

नेसे शालू रंगीत  नऊवार

शोभे नानाअलंकार त्यावर

रंगीत फुलेमाळा सभोवार

रुप दिसे ते राजस सुंदर!

 

जसे गाईचे वासरु

शेळीचे छोटे कोकरू

शांताईचे मी लेकरू

घाली मायेची पाखरू !

 

नाम घेता तिचे  हो मुखी

जीवन हो आनंदी सुखी

न राही कोणी कष्टी दु:खी

शांतादुर्गा ती पाठीराखी!

 

© सौ. शशी नाईक-नाडकर्णी

फोन  नं. 8425933533

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कविता ☆ साप्ताहिक स्तम्भ # 78 – विजय साहित्य – भगवन शंकर ☆ कविराज विजय यशवंत सातपुते

कविराज विजय यशवंत सातपुते

☆ साप्ताहिक स्तम्भ # 78 – विजय साहित्य – भगवान शंकर ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

भस्म विलेपित

देव महादेव शिव

रौद्ररूपी निव

अंगीकार ….!

 

शिवलिंग रूप

दुध, जल, अभिषेक

भक्तीभाव  नेक

पुजनात….!

 

उमा महेश्वर

त्याचा त्रिलोकी स्विकार

स्मशान संचार

उद्धारक….!

 

शिव लिलामृत

करा श्रवण पठण

शिवाचे मनन

लवलाही …..!

 

गणेशाचे पिता

निलकंठ शोभे नाम

कैलासाचे धाम

शिवलोक……!

 

त्रिशूल डमरू

सवे नंदी शिवगण

त्रिनेत्री सुमन

शंकरासी ….!

 

मार्त॔ड भैरव

अवतारी शिवाचेच रूप

सृजन स्वरूप

ओंकारात…..!

 

© विजय यशवंत सातपुते

यशश्री, 100 ब दीपलक्ष्मी सोसायटी,  सहकार नगर नंबर दोन, पुणे 411 009.

मोबाईल  9371319798

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ सुजित साहित्य # 69 – स्त्री आणि कविता…! ☆ श्री सुजित कदम

श्री सुजित कदम

☆ साप्ताहिक स्तंभ – सुजित साहित्य #69 ☆ 

☆ स्त्री आणि कविता…! ☆ 

कधी नुकत्याच

जन्मलेल्या मुलीमध्ये,

कधी आई मध्ये,

कधी बाई मध्ये,

कधी बहिणी मध्ये,

कधी अर्धंगिनी मध्ये,

प्रत्येक स्त्री मध्ये,

मला दिसत असते,

पुर्ण अपुर्ण अशी…

रोज एक नवीन

कविता…!

 

© सुजित कदम

पुणे, महाराष्ट्र

मो.७२७६२८२६२६

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ कुठे कुठे क्षितिजाशी ☆ सुश्री प्रज्ञा मिरासदार

☆ कवितेचा उत्सव ☆ कुठे कुठे क्षितिजाशी ☆ सुश्री प्रज्ञा मिरासदार 

दूर कुठे क्षितिजाशी टेकडीच्या माथ्यावर |

शांत रम्य जागी उभे एक शिवाचे मंदिर ||१||

 

चार वृक्ष भोवताली दिसे वनश्रीची शोभा |

गाभाऱ्यात तेज फाके शिवपिंडीची ती प्रभा ||२||

 

भक्तिरंगी परिसर होई सांजेच्या वेळेला |

पक्षी येती झाडांवर भक्तगण आरतीला ||३||

 

पलीकडे शांत नदी जळ संथ संथ वाहे |

उतरत्या सांजवेळी सूर्य डोकावून पाहे ||४||

 

एक भगवी पताका मंदिराच्या वर डुले |

शांत नदीपात्रामध्ये दूर दूर होडी चाले ||५||

 

भास्कराचा लाल गोळा बुडताना पाण्यावर |

येई क्षितिजाभोवती लाल केशरी किनार ||६||

 

मंद नंदादीप तेवे शंकराच्या गाभाऱ्याशी |

हळू येई संध्याराणी कुठे कुठे क्षितिजाशी ||७||

 

नंदादीपाच्या तेजाने जाई भरून गाभारा |

झाला निशेच्या अधीन रम्य आसमंत सारा ||८||

 

© सुश्री प्रज्ञा मिरासदार

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ देशातील विकासात महिलांचा सहभाग ☆ सुश्री दीप्ती कोदंड कुलकर्णी

सुश्री दीप्ती कोदंड कुलकर्णी

 ☆ विविधा ☆ देशातील विकासात महिलांचा सहभाग ☆ सुश्री दीप्ती कोदंड कुलकर्णी ☆ 

पारतंत्र्याच्या काळात जेंव्हा स्त्रीचे कार्यक्षेत्र हे फक्त ‘चूल आणि मूल’ होते, तेंव्हा स्त्रीवर खूपच बंधने होती. पण त्यापूर्वी च्या गार्गी आणि मैत्रेयीं सारख्या विदुषींना आपण विसरुन चालणार नाही. सावित्रीबाई फुलेंनी स्त्रियांना शिक्षणाची द्वारे खुली करुन दिली नि स्त्रिया शिक्षित होऊ लागल्या. स्त्रियांना शिक्षणाची द्वारे खुली होताच त्यांनी विविध क्षेत्रात घोडदौड केलेली दिसते. आज १०वी, १२वी पासून पदवी वपदव्युत्तर स्तरावरील गुणवत्ता यादी पाहिली तर अनेक टप्प्यावर महिला आघाडीवर आहेत असेच दिसते. महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि भारतीय लोकसेवा आयोगातही स्त्रियांनी अनेक परीक्षातगुणवत्तेसह यश संपादणुक केली आहे स्त्रिया एकाच वेळी घर आणि घराबाहेरील कार्यक्षेत्र ही कुशलतेने हाताळू शकतात हे आज  स्पष्ट झाले आहे. याचे मुख्य कारण असे की बुद्धीबरोबरच सहनशीलता, चिकाटी व परिश्रमी व्रुत्ती या बाबींची महिलांना विशेष देणगीच लाभली आहे.स्त्रिया मोठ्या नेटाने आणि जिद्दीने परिस्थिती वर मात अरतात असे आज समाजात पदोपदी दिसून येते.

स्वातंत्रयानंतर आजतागायत शिक्षण, क्रुषी,विज्ञान, दक्षणवळण, राजकारण, समाजकारण, अशा सर्वच क्षेत्रात स्त्रियांची प्रगती लक्षणीय ठरली आहे. देशाच्या विकासात विविध क्षेत्रात स्त्रियांनी आदर्श निर्माण केले आहेत. १५आँगस्ट १९४७ला सरोजिनी नायडू यांना अनुक्रमे पहिल्या महिला गव्हर्नर होण्याचा

आणि पहिल्या कँबिनेट मंत्री होण्याचामान पटकावला. सुचेता क्रुपलानी १९६३ मध्ये उत्तर प्रदेशच्या पहिल्या स्त्री मुख्यमंत्री बनल्या. १९५९ला पहिल्या स्त्री न्यायाधीश भारतास मिळाल्या तर १९६६ला इंदिरा गांधींनी पहिले स्त्री पंतप्रधान पद भूषविले. १९७२ला किरण बेदी या स्त्री ने महिला पोलीस सेवेत येण्याचा विक्रम केला. १९७९मध्येतर मदर तेरेसांनी शांतीचे नोबेल पारितोषिक प्राप्त केले. १९८४मध्ये बचेंद्री पाल या एका अद्वितीय स्त्री ने एव्हरेस्ट हे पर्वतशिखर पादाक्रांत केले. १९९९ मध्ये सोनिया गांधी राजकारणात स्त्री नेत्या बनल्या. करनाम मल्लेश्वरीने आँलिम्पिकमध्ये पदक मिळवून क्रीडा क्षेत्रात ठसा उमटविला तर पी. टी उषा भारताची सुवर्णकन्या बनली.साहित्य क्षेत्रात ही डॉ. विजया वाड यांच्यासारख्या महिलेने उत्तुंग कामगिरी केली आहे. इतकेच काय तर सन २००७मध्ये मा.प्रतिभाताई पाटील या  देशाच्या सन्माननीय राष्ट्रपती बनल्या. २०१४ला मा.पंतप्रधान मोदींच्या मंत्रीमंडळात ७महिला मंत्रीपदी विराजमान झाल्या. सुस्मिता बोस, अरुंधती राँय सारख्या लेखिका, शांता शेळके यांच्यासारख्या  लेखिका, बाँर्डर सुरक्षा विभागातील अधिकारी, लढाऊ वैमानिक, नौदल अधिकारी अशी सर्व महत्वाची पदे आज स्त्रिया अत्यंत जबाबदारी ने पेलत आहेत. अर्थमंत्री मा.निर्मला सीतारामन या आज भारताच्या अर्थमंत्री आहेत. नुकतेच त्यांनी अर्थसंकल्प(बजेट) जाहीर केले आहे.

स्त्रियांची ही दैदिप्यमान कामगिरी पाहता देशाच्या विकासात महिलांचे स्थान अनन्यसाधारण आहे हे आज सिद्ध झाले आहे.

“जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धरी”. या उक्तीनुसार स्त्रिया भावी पिढीवर सुसंस्कारही करीत आहेत. म्हणूनच  कुटुंबाचा नि त्याचबरोबर देशाचा विकासही महिला सक्षमतेने करीत आहेत. कला,क्रीडा, साहित्य, विज्ञान, मनोरंजन, राजकारण, समाजकारण, अर्थकारण अशा सर्वच क्षेत्रात महिलांचा सहभाग लक्षणीय आहे.ऐश्वर्या राँय-बच्चन, प्रियंका चोप्रा इ.सारख्याबुद्धी आणि सौंदर्याचा मिलाफ असणार्या स्त्रिया ही आज जगामध्ये भारताची एक नवी ओळख करुन देत आहेत. देश, राज्य, जिल्हा, गाव अशा सर्वच पातळ्यांवर सरपंच, नगरसेविका, महापौर मंत्री अशा सर्व प्रकारची पदे कौशल्याने हाताळून यशस्वी होत आहेत. म्हणून च स्त्रियांच्या प्रगतीचा आलेख आज उंचावलेला दिसत आहे.

शेवटी इतकेच म्हणावे वाटते कि कष्टकरी महिला, ग्रुहिणी, नि उच्चपदस्थ अशा देशातील सर्वच महिलांना फक्त ८मार्च या एका जागतिक महिला दिनीच चांगली, सन्मानाची वागणुक देऊ नये तर महिलांशी नेहमीच सौजन्याने, आदराने वागावे कारण म्हंटलेच आहे

“यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता”

© सुश्री दीप्ती कोदंड कुलकर्णी

भ्र.9552448461

कोल्हापूर

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कवितेच्या प्रदेशात # 89 – ☆ पुन्हा आठ मार्च ☆ सुश्री प्रभा सोनवणे

सुश्री प्रभा सोनवणे

(आप  प्रत्येक बुधवार को सुश्री प्रभा सोनवणे जी  के उत्कृष्ट साहित्य को  साप्ताहिक स्तम्भ  – “कवितेच्या प्रदेशात” पढ़ सकते  हैं।)

☆ साप्ताहिक स्तम्भ – कवितेच्या प्रदेशात # 89 ☆

 ☆ पुन्हा आठ मार्च  ☆ 

आजही ती कामावर आली,

महिला दिन,  स्त्री स्वातंत्र्य, समानता—–

हे काहीच ठाऊक नव्हतं तिला!

 

ती घासते भांडी, धुणं धुते,

केर फरशी करते,

लावते संसाराला हातभार,

हातभार कसला?

खरंतर तीच रेटत असते अख्खा संसार!

 

सात घरं उजळून टाकते,

भांड्यांचे ढीग, दोन बादल्या धुणं,

सात घरच्या सात त-हा,

तीच्या कष्टाची किंमत ठरवलेली!

 

पण म्हणतं का कुणी,

“माझी कामवाली माझा अभिमान”

हसलात ना?

 

एकूण दुर्लक्षितच असते ही जमात!

आठ मार्चला मला आठवल्या,

लहानपणापासून हातात आयता काॅफीचा कप आणून देणारी,

पाट्यावर वाटण वाटणारी “कली”

आणि दिवसभर दिमतीला असलेल्या यमुनाबाई, कमल, रसवंती, समिंदरा,गुंफा…. सगळ्या ..

सगळ्या कष्टकरी कामवाल्या आणि,

मी आयुष्यात जगलेले सगळे सुखवस्तू क्षण!

ना बाहेरचे कष्ट ना घरातले

फारसे,

तरीही किती उमाळे बाईपणाच्या दुःखाचे?

भरल्या पोटी लिहिलेल्या कवितांचे,

सुखासिन आयुष्यातही कुरवाळलेल्या दुःखाचे,

मिळवलेल्या पुरस्कारांचे!

 

सारी पदकं आयुष्यातल्या सगळ्या कामवाल्यांच्या कष्टांना बहाल करून——

 

“अनुराधा औरंगाबादकर” सारख्या तेजशलाकेचं कौतुक करत साजरा करीन हा आठ मार्च—

 

आठवतंय त्यांनी सांगितलेलं……

“मी आयुष्यात कधीही कामवाली लावली नाही,सगळी कामं स्वतःचं केली आणि सोनं कधीच मिरवलं नाही अंगाखांद्यावर!”

 

इथून पुढे देईन दर आठ मार्चला

कामवाली ला सुट्टी,

हा आठ मार्च निश्चितच वेगळा

आहे माझ्या साठी!

 

© प्रभा सोनवणे

“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ मी कोण ? ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

 ☆ कवितेचा उत्सव ☆ मी कोण ? ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

प्रश्न मला पडतो नेहेमी

आहे तरी कोण मी

माणूस म्हणून जगतेय खरी

पण देवाची हो काय हमी?

 

आहे मुलगी, आहे पत्नी

आहे आणि आई

बहीण, मावशी, आत्या

आणि असेच काही-बाही.

 

पण उपयोग माझा काय

हे आत्ता कळतंय जराजरा

देवाजीच्या मनात काय

तो अर्थ कळतोय आत्ता खरा.

 

मी म्हणजे एक मोठा दगड

पण नाही साधासुधा

खापर फोडण्यासाठीच

करतात

वापर सगळे सदा.

 

पण महती माझी मलाच ठाऊक

मी नगण्य नाही मुळी

माथी नारळ फोडून घेणाऱ्या —

देवळामधल्या दगडाची

मी बहीण जणू हो जुळी||

 

©  सुश्री मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ माझ्या माहेराची वाट ☆ श्री आनंदहरी

 ☆ कवितेचा उत्सव ☆ माझ्या माहेराची वाट ☆ श्री आनंदहरी ☆ 

माझ्या माहेराची वाट

झाली पुसट पुसट

दिस लोटले किती हे

नाही कुणाचीच भेट

 

मन ओढाळ वासरू

त्याला कसे मी आवरू

चित्त थाऱ्याव राहीना

कशी मलाच सावरू

 

मायसावलीची ओढ

रामरगाडा हा द्वाड

किती करता सरंना

जीवा वाटते ना गोड

 

शब्द ओठात ना जरी

बाप डोळ्यांनी बोलतो

मला उराशी धरुनी

काळजात साठवतो

 

मना माहेराची आस

मन माहेरात राही

चुलीवर ठेवलेलं

दूध हळू उतू जाई

 

© श्री आनंदहरी

इस्लामपूर, जि. सांगली

भ्रमणध्वनी:-  8275178099

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares
image_print