मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ चेहरा हरवलेला… ☆ श्री शरद कुलकर्णी

☆ कवितेचा उत्सव ☆ चेहरा हरवलेला… ☆ श्री शरद कुलकर्णी☆ 

आरशांनी व्यक्त केले,

अंतरीचे शल्य मोठे.

केले कबूल त्यांनी,

दाविले प्रतिबिंब खोटे.

 

रुप माझे ज्या समजलो,

बेगडी बुरखाच होता.

तोतया तोही निपजला ,

जो माझ्याच सारखा होता.

 

बेनकाब झाले अखेरी,

कळले उशिरा जरा.

संभ्रमि प्रतिमाच सार्‍या ,

हरवला चेहरा खरा.

 

©  श्री शरद कुलकर्णी

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ पायवाट…. ☆ श्री विक्रम मालन आप्पासो शिंदे

श्री विक्रम मालन आप्पासो शिंदे

7 Reasons Why Savitribai Phule Was Most Kickass Feminist | Youth Ki Awaaz

(सावित्री बाई फुले)

(जन्म – 3 जानेवारी 1831  मृत्यु –  10 मार्च 1897 )

☆ कवितेचा उत्सव ☆ पायवाट…. ☆ श्री विक्रम मालन आप्पासो शिंदे ☆ 

आता.. आता स्त्रीवादाच्या

जाहीर गप्पा चालू होतील…

तुला माहित आहे का साऊ ??

केवळ आणि केवळ

तुझ्या जयंतीच्या निमित्ताने..!

मग मोबाईल च्या स्टेटस वर दाखवू

आम्ही, किती तुझ्या विचारांचे पाईक आहोत ते…

फक्त स्टेटस वर आणि त्याच दिवसापुरतं बरं का..!!

आणि ते पण इतरांचे स्टेटस पाहिले की इर्षा होते म्हणून,

कारण..आम्हालाही दाखवायचं असतं ना,

की आम्ही किती मोठे समाजसेवक आहोत ते…

बाकी काही नाही गं..!

जागोजागी होणाऱ्या तुझ्या जयंतीच्या कार्यक्रमातून

आम्ही मग समतेच्या बोंबा मारू

छाती ठोकठोकून…

पण केवळ त्याच दिवसापुरतं बरं का..!

खरे समतावादी

आम्ही अजून झालोच नाही बघ..!!

आणि स्त्रीचे स्वातंत्र्य आम्ही स्वीकारलंय

पण ते शेजारच्या घरात..

आमच्या घरात अजून स्त्री

चार भिंतीत आहे ..!!

आमच्या घराण्याचे नाक असते ना ती

म्हणून तिच्या चालण्या बोलण्यावर संशय

अगणित बंधनं… धाक आणि पारतंत्र्य देखील…!!

आमचा पुरुष

तुलाच घायाळ करतो

देहिक भुकेच्या वासनेने…

फसवणूक..बलात्कार..बळजोरी

छळ… कपट…हिंसा आणि बरचं काही…

पण, चालतं आम्हाला कारण तो पुरुष आहे..आणि,

स्वातंत्र्य हा फक्त पुरुषाचा

जन्मसिद्ध हक्क आहे

इतकं प्रखर संकुचित जगतो आम्ही..!!

तुमच्या नावानं चळवळी देखील झाल्या

पण त्यांनाही तुमचा मार्ग किती समजला हे अनुत्तरीत…

चळवळ ही समाजाभिमुख झाली

पण घराभिमुख नाही बरं का..!

स्त्रीवाद तर संपलाय कधीचाच..

सगळं काही आभासीच…!

उसन्या मोठेपणाची दुनिया झाली आहे

सत्यावर अन्याय होत आहे..

हा समाज मेलाय कायमचा…

आणि माणूस नावाचा प्राणी बेभान झालाय..

जाती-धर्म ,वर्ण,पंथ,भेदभाव,

आरक्षणाच्या समीकरणात..!!

साऊ,

आम्हाला आज  खरचं तुमची गरज आहे..

तुम्ही पाझरावे आमच्या विचारांमधून

आमच्या कृतीतून

आणि आमच्या मानवतेच्या सच्चेपणातून…!!

तुम्ही येताय? परत येताय??

पण,आज तुम्ही परत येणार असाल

तर फक्त दोघेच येऊ नका…

आतापर्यंतच्या सगळ्या महापुरुषांना सोबत घेऊन या..

तुम्ही एक होता..एक आहात हे दाखवून द्या…

तेव्हाच आमचा माणूस भानावर येईल…

माणूस ” माणूस ” होईल

तुमच्या पायवाटेवर…!!

आता मोबाईल वरचा

काही वेळाने स्टेटस बदलेल

पण.. माणूस म्हणून जगण्यासाठी

तुम्ही दाखवून दिलेल्या

मानवतेच्या पायवाटा

अखंड राहतील हे मात्र नक्की..!!

 

©  कवी विक्रम मालन आप्पासो शिंदे

मु/पो-वेळू (पाणी फाउंडेशन), तालुका-कोरेगाव, जिल्हा-सातारा 415511

मोबाइल-7743884307

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ चुकली दिशा तरीही.. स्व विंदा करंदीकर ☆ कवितेचे रसग्रहण – सौ. राधिका भांडारकर

स्व विंदा करंदीकर

Vinda Karandikar memorial in Chetana college | चेतना महाविद्यालयात विंदांचे राष्ट्रीय स्मारक | Loksatta

स्व गोविंद विनायक करंदीकर ख्यातनाम ‘विंदा करंदीकर’

जन्म – २३ ऑगस्ट १९१८ – मृत्यू – १४ मार्च २०१०

 ☆ कवितेचा उत्सव ☆ चुकली दिशा तरीही.. स्व विंदा करंदीकर ☆ कवितेचे रसग्रहण – सौ. राधिका भांडारकर ☆ 

चुकली दिशा तरीही हुकले न श्रेय सारे

वेड्या मुशाफिराला सामील सर्व तारे

 

मी चालतो अखंड चालायचे म्हणून

धुंदीत या गतीच्या सारेच पंथ प्यारे

 

डरतात वादळांना जे दास त्या ध्रुवाचे

हे शीड तोडले की अनुकुल सर्व तारे

 

मग्रुर प्राक्तनाचा मी फाडला नकाशा

विझले तिथेच सारे ते मागचे ईशारे

 

चुकली दिशा तरीही आकाश एकआहे

हे जाणतो तयाला वाटेल तेथ न्या रे

 

आशा तशी निराशा हे श्रेय सावधांचे

बेसावधास कैसे डसणार हे निखारे?

 

कवी – स्व विंदा करंदीकर  

(या कवितेचे रसग्रहण काव्यानंद मध्ये दिले आहे.)

प्रस्तुति –  सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ शिशीर-शिणगार ☆ श्रीशैल चौगुले

☆ कवितेचा उत्सव ☆ शिशीर-शिणगार ☆ श्रीशैल चौगुले ☆

शिशीर-शिशीर  मनात रानात

दव पांघरुन   काळीज पानात.

धुके पहाटेचे  डोळेच आभाळ

थंड शरीरास   किरणे वनात.

तेज पूर्वदिशी  झाकून अलोक

मंद पावलात  गारवा कानात.

हळू चिवचिव  पाखरे अंगणी

ऊडे भुर्रकन   थवाच तृणात.

मोती साठलेले  कळी फुलांवर

थोडी खसबस  कावळा मौनात.

तरी शिडकावा  सजवी निसर्ग

भूमी सातरंगी   सौंदर्य  तैनात.

ऋतू शिशीराचा  हिमाचा मज्जाव

नभी  आर्यरथ   स्वर्ग सदनात.

स्मृती  शिणगार  शिशीर शिवार

माया  हिरवाई   सकाळ अधनात.

 

© श्रीशैल चौगुले

९६७३०१२०९०

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ साप्ताहिक स्तम्भ – हे शब्द अंतरीचे # 31 ☆ कांदा पोहे… ☆ कवी राज शास्त्री

कवी राज शास्त्री

☆ साप्ताहिक स्तम्भ – हे शब्द अंतरीचे # 31 ☆ 

☆ कांदा पोहे… ☆

 

प्रथम मान मिळतो ज्यांना

कांदा पोहे म्हणतात त्यांना…

 

पाहुणे आले कांदे पोहे

भूक लागली कांदा पोहे…

 

सोयरीक जुळते नवीन जेव्हा

कांदा पोहे तेव्हा तेव्हा…

 

कांदा चिरावा मस्त

त्यात हिरवे वाटाणे रास्त…

 

हिरवी मिरची सवे कोथिंबीर

जिरेपूड आणि तेल धार…

 

मीठ आणि हळद मिळते

खाणाऱ्यांची झोप पळते…

 

असा होतो बेत मस्त

जसा मिळावा, दोस्तास दोस्त…

 

महाराष्ट्राचे हे स्वादिष्ट व्यंजन

मानून घ्या तुम्ही गोड करुनि मन…

 

© कवी म. मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सरणारे वर्ष मी ☆ स्व. मंगेश केशव पाडगांवकर

स्व. मंगेश केशव पाडगांवकर

Padgaonkar2.jpg

जन्म – 10 मार्च 1929

मृत्यु – 30 डिसेंबर 2015

सलाम’ या कवितासंग्रहासाठी त्यांना इ.स. १९८० साली साहित्य अकादमी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

मंगेश पाडगांवकरांची वर्षाच्या निरोपाची सुंदर कविता…

☆ कवितेचा उत्सव ☆ सरणारे वर्ष मी ☆ प्रा. सौ. सुमती पवार ☆ 

मी उद्या असणार नाही

असेल कोणी दुसरे

मित्रहो सदैव राहोत

चेहरे तुमचे हासरे

झाले असेल चांगले

किंवा वाईटही काही

मी माझे काम केले

नेहमीच असतो राईट मी

माना अथवा नका मानू

तुमची माझी नाळ आहे

चांगले होवो अथवा वाईट

मी फक्त ” काळ ” आहे

उपकारही नका मानू

आणि दोषही देऊ नका

निरोप माझा घेताना

गेट पर्यन्त ही येऊ नका

उगवत्याला ” नमस्कार “

हीच रीत येथली

विसरु नका ‘ एक वर्ष ‘

साथ होती आपली

धुंद असेल जग उद्या

नव वर्षाच्या स्वागताला तुम्ही मला खुशाल विसरा दोष माझा प्राक्तनाला

शिव्या ,शाप,लोभ,माया

यातले नको काही

मी माझे काम केले

बाकी दुसरे काही नाही

निघताना ” पुन्हा भेटू “

असे मी म्हणणार नाही

” वचन ” हे कसे देऊ

जे मी पाळणार नाही

मी कोण ? सांगतो

” शुभ आशीष ” देऊ द्या

” सरणारे वर्ष ” मी

आता मला जाऊ द्या।

चित्र सौजन्य – मंगेश पाडगांवकर – विकिपीडिया (wikipedia.org)

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ मन पांखरू पांखरू …. ☆ प्रा. सौ. सुमती पवार

प्रा. सौ. सुमती पवार

☆ कवितेचा उत्सव ☆ मन पाखरू पाखरू….. ☆ प्रा. सौ. सुमती पवार ☆ 

मन पांखरू पांखरू डहाळीवर झुलते

वारा आला कानापाशी आणि त्याच्याशी बोलते

 

मन पांखरू पांखरू आभाळातच उडाले

गरूडाच्या पंखावर कडेकपारीत गेले..

 

मन पांखरू पांखरू झाले हिरवे हिरवे

आणि फांद्या फांद्यावर दिमाखात ते मिरवे…

 

मन पांखरू पांखरू फुल पांखरूच झाले

गुलू गुलू हासतचं फुलांवरती डोलले …

 

मन पांखरू पांखरू झाले जास्वंदीचे पान

फुलताच पारिजात गंधाळले सारे रान…

 

मन पांखरू पांखरू झाले काटे कोरांटीच

आणि रातराणीचा हो झोका गेला पहा उंच…

 

मन पांखरू पांखरू आभाळात ..धरेवर

नाही येत चिमटीत फिरविते गरगर …

 

मन पांखरू पांखरू कधी खुपसते चोच

मग समजावे त्याला पहा लागली हो ठेच..

 

मन पांखरू पांखरू होत नाहीच शहाणे

रोज रोज गाई पहा गाणे नवेच … उखाणे..

 

मन पांखरू पांखरू रोज त्याच्या नाना कळा

असो कसे ही ..पण ..ते …

त्याचा लागतोच लळा…

 

© प्रा.सौ.सुमती पवार ,नाशिक

दि: १८/०९/२०२०,  वेळ : ११:२५ रात्री

(९७६३६०५६४२)

[email protected]

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ आपणच व्हावे कालनिर्णय ☆ श्री शुभम अनंत पत्की

श्री शुभम अनंत पत्की

☆ कवितेचा उत्सव ☆ आपणच व्हावे कालनिर्णय ☆ श्री शुभम अनंत पत्की 

गरज वाटेना आता काहीच

विचार विद्रोही ठेवण्याची,

उद्विग्न होणे मान्य नाहीच,

वाट पाहतो वर्ष संपण्याची

 

नवीन आशा असेल मनी,

नाही नुसती दिनदर्शिका

थोडी भीती राहिल जनी,

वर्तुळच भेदू नये स्पर्शिका

 

नको जरी उसनं अवसान,

थोडं तरी धाडस हवं

होईल आपलंच नुकसान,

जेव्हा संकट दिसेल नवं

 

पुन्हा उद्दिष्ट स्मरावे आपण,

घ्यावे सर्व महत्वाचे निर्णय

पुन्हा ध्येय करावे स्थापन,

आपणच व्हावे कालनिर्णय…

 

© श्री शुभम अनंत पत्की

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ शब्दांची गुंफण ☆ सौ. मनीषा रायजादे-पाटील

☆ कवितेचा उत्सव ☆ शब्दांची गुंफण ☆ सौ. मनीषा रायजादे-पाटील ☆

 

शब्दांची गुंफण मी

काळजातून करते

भाव सारे मनातले

शब्दांसोबत मांडते

 

शब्द वारा वाहताना

जीवन कळी उमलते

नक्षत्रांचा साज ऋतू

गंध शब्दांसवे उधळते

 

दुःखाला सारून दूर

शब्द अमृतधार बरसते

प्रेमाचा तेवता दीप

हृदय कुपीत लावते

 

जीवनाच्या  वाटेवर

शब्दांसोबत चालते

शब्दांच्याच कुशीत

वात्सल्य  ओंथबते

 

नाद तरंगे विश्वब्रह्म

शब्दांतुन झंकारते

हृदयाच्या  मृदुंगावर

शब्द अभंग आळवते

 

© सौ. मनीषा रायजादे-पाटील

सांगली

9503334279

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ पाऊले त्याची पुढे ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित

श्री सुहास रघुनाथ पंडित

☆ कवितेचा उत्सव ☆ पाऊले त्याची पुढे ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ 

काय मोठे जाहले हो वर्ष आता संपले

वर्ष आणि एक पुढचे भिंतीवरी हे टांगले

 

पाऊले बारा अशी जो नित्यनेमे टाकतो

काळ त्याचे नाव आहे,ना कधी तो थांबतो

 

दुःख आणि सुख अथवा यश असो वा संकट

ना कधी तो भाववेडा,वा कधी ना उत्कट

 

जाहली वर्षे किती अन् राहिली पुढती किती

ना कधी तो रंगतो या आकड्यांच्या  संगती

 

वार आणि तारखांचा खेळ आम्ही मांडतो

पुण्यतिथी वा जयंती ना कधी तो मानतो

 

वर्ष जाते,वर्ष येते,आयुष्य अपुले संपते

कालचक्राच्या गतीने क्षणक्षणाने खंगते

 

सोडूया संकल्प आणि देऊया वचने नवी

जाणतो आम्ही जरी ही सर्व ठरती अल्पजीवी

 

घालूनी हातात त्याच्या हात,आता चालणे

पाऊले त्याची पुढे अन् मागूनी हे धावणे.

 

©  श्री सुहास रघुनाथ पंडित

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares
image_print