☆ तुका म्हणे – काय उणे जाले… – अभंग रचना ☆ रसग्रहण – प्रा तुकाराम दादा पाटील ☆
☆ तुका म्हणे ☆
*
काय उणें जालें तुज समर्थासी /
जसा मजपाशीं कोण दोष //१//
*
जो तूं माझा न करिसिं अंगीकार/
सांगेन वेव्हार संतांमधी //२//
*
तुजविण रत आणिकाचें ठयीं /
ऐसें कोण ग्वाही दावीं मज //३//
*
तुका म्हणे काय धरुनी गुमान /
सांग उगवून पांडुरंगा //४//
– संत तुकाराम.
*
तुका म्हणे
तुकाराम महाराज आपल्या अधीकार वाणीने आपल्या वर्तनात विषयी प्रत्यक्ष पांडुरंगालाच जाब विचारताना म्हणतात. तू पूर्ण समर्थ आहेस.
तू सर्व काही जाणतोस. माझ्या वर्तनामुळे तुला मी कोणता त्रास देतोय?. ज्या मुळे तू माझा स्वीकार करत नाहीस. ते कारण तू मला सांग. नाही तर हा तुझा माझ्या सोबत घडत असलेला व्यवहार काही योग्य नाही असे मी सगळ्या संतमंडळी समोर सांगेन. मी केवळ तुझ्याच चरणाशी लीन होवून तुझीच मनोभावे सेवा करत आहे. मी तुला सोडून दुस-या कुणाची भक्ती करत असल्यास त्याचा तू मला सबळ पुरावा दे. तो माझ्या समोर आण. या बाबतीत तू मौन पाळून गप्प बसू नकोस. तू माझा स्वीकार का करत नाहीस. हे मला आता कळायलाच हवे. या वरून तुकाराम महाराज पांडुरंगाची किती मनोभावे आणि श्रद्धापुर्वक सेवा करत होते ते कळते. त्या मुळेच ते पांडुरंगावर आपला हक्क आहे असे मानत होते. त्याला आपले मनोगत सांगत होते. पांडुरंगाचे मार्गदर्शन घेऊन आपला जीवनक्रम चालवीत होते. हेच यातून आपल्या सारख्या सामान्य माणसाला कळून येते.
☆ तुका म्हणे – कोणाच्या आधारे करू मी विचार… – अभंग रचना ☆ रसग्रहण – प्रा तुकाराम दादा पाटील ☆
☆ तुका म्हणे ☆
काव्यानंद
कोणाच्या आधारें करूं मी विचार/
कोण देईल धीर माझ्या जीवा//१//
*
शास्त्रज्ञ पंडित नव्हें मी वाचक /
यातिशुद्ध एक ठाव नाहीं//२//
*
कलियुगीं बहु कुशळ हे जन /
छळितील गुण तुझे गातां //३//
*
मज हा संदेह झाला दोन्हीं सवा /
भजन करूंं देवा किंवा नको //४//
*
तुका म्हणे आतां दुराविता जन /
किंवा हे मरण भले दोन्ही//५//
– संत तुकाराम.
*
तुका म्हणे
आपल्या सभोवताली निर्माण झालेले सामाजिक वातवरत पाहून त्याच्या वर वैतागलेले तुकाराम महाराज देवालाच म्हणतात.अशा या जाचातून जाणा-या कठीण काळात कोणाच्या आधारावर कोणता विचार करू. या नाजूक वेळी मला कोण आधार देईल.मी कोणी फार मोठा शास्त्रज्ञ पंडित किंवा वाचकही नाही.तसेच मी उच्य कुळात जन्मलोयकी नाही हेही मला निपटणे ठाऊक नाही.
या कलियुगात लोक फारच कुशल आणि हुशार आणि चाणाक्ष झाले आहेत.मी तुझे गुण गाणं करतो. तुझी मनोभावे पूजा करतो. केवळ तुझेच नामस्मरण करतो . म्हणून त्यांनी माझा छळवाद मांडला आहे. म्हणूनच माझ्या मनात त्यांच्या विषयीचा संदेह आणि संशय आता बळावत चालला आहे. तेव्हा मी तुझे भजनपुजन आणि नामस्मरण करावे की नको हे आता तूच मला सांग. माझ्या मनाला आता कठीण पेच पडला आहे. मी हे माझे कार्य बंद केले तर जन लोकासोबत जोडलेला मी माझा संपर्क हरवून बसेन. लोक माझ्यापासून दूर जातील ते मला नको आहे. तुझे नामस्मरण बंद करणे आणि जनलोकापासून दूर जाणे या दोन्ही गोष्टी माला मरणा सारख्याच वाटतात. आता या पेचातून तुझ्या वाचून माझी सुटका कोणीही करू शकत नाही. तुकाराम महाराजाना छळणा-या लोकांच्या होणा-या त्रासामुळे ते किती हैराण झाले होते हे यावरून कळते. म्हणूनच त्यांनी आपली व्यथा इतराना न सांगता ती प्रत्यक्षात देवापुढेच मांडली आहे .
☆ तुका म्हणे – तुज जसा कोणी… – अभंग रचना ☆ रसग्रहण – प्रा तुकाराम दादा पाटील ☆
☆ तुका म्हणे ☆
*
तुज जसा कोण उदाराची रासी/
आपुलेंचि देसी पद दासा //१//
*
शुद्ध हीन कांहीं न पाहासु कुळ /
करिसी निर्मळ वास देहीं //२//
*
भावें हें कदान्न खासी त्याचे घरी/
आमट्यांच्या परी नावडती //३//
*
नवजासी जेथें दुरी दवडितां /
न तेही जो चित्ता योगियाच्या//४//
*
तुका म्हणे ऐसीं ब्रीदे तुझी खरीं /
बोलतील चारी वेद मुखें //५//
*
तुका म्हणे
तुकाराम महाराज देवाला त्याची ओळख करून देताना देवालाच अत्यंत आदराने म्हणतात, देवा या जगात तुझ्या सारखा तूच उदार मनाचा आहेस. कारण तू तुझे पद तुझ्या दासालाही सहजपणे देवून टाकतोस. जेव्हा तू हे करतोस तेव्हा तू ज्याला तुझे पद देतोस तेव्हा त्याची जात, कुळी, धर्म काय आहे हे पाहून भेदभव मुळीच करत नाहीस. फक्त ज्याचा देह निर्मळ आणि मन शुद्ध आहे की नाही तेवढेच पहातोस. शुद्ध आणि निर्मळ मनाच्या भक्ताच्या घरचे कदान्न ही तू आवडीने खातोस. पण जो अभक्त आहे त्याच्या घरचे तुला काहीही चालत नाही. तुला आवडतही नाही. नवागत भक्ताने तुझी मनोभावे भक्ती करायला सुरवात केलेल्या भक्ताला तू तुझ्या पासून त्याला दूर लोटताना कोणत्याही महान योगी पुरुषाला कधीच आढळले नाही. दिसले ही नाही.असा तुझा स्वभाव दिलदार आहे. ते तुझे ब्रीदच आहे. असे मी म्हणत नाही तर चारी वेद त्यांच्या मुखाने हेच सातत्याने बोलतात. देवाची ही खरीखुरी ओळख महाराज आपल्याला स्वानुभवातून सांगतात. आणि देवानेही कधी कोणत्याही स्वरूपाचा भेदभाव पाळलेला नाही हे सप्रमाण दाखवून देतात. मग सामान्य माणसांनी, महापंडित व महान योगी पुरुषांनी तरी तो का पाळावा. समतेचा आणि समानतेचा केवढा महान विचार महारज किती सहजतेने सांगून जातात.आणि त्याचा किती मोठा परिणाम होतो हे सहजपणे लक्षात येते.
आजही समाजात स्त्रीची हीच प्रतिमा आहे किंबहुना समाजाला स्त्रीचं हेच रूप अपेक्षित आहे, मान्य आहे.
हजारो वर्षांपासून स्त्रीच्या दुःखात, वेदनेत, समस्येत फारसा मूलभूत फरक झालेला जाणवत नाही आणि असलाच फरक तर तो केवळ एक मुलामा आहे. खोटा, वरवररचा. आत मध्ये मात्र तेच जळणं, तोच अंगार. अशाच अर्थाची, माननीय कवयित्री सौ. सुमती पवार यांची “दुःख वाटे चावळावे.. ” ही स्त्री वेदना व्यक्त करणारी आणि मनातले धुमसणारे निखारे फुलवणारी एक अतिशय वास्तववादी सुरेख कविता वाचनात आली. याच कवितेचा रसास्वाद आज आपण घेऊया.
☆ दु:ख वाटे चावळावे… ☆
सुखदु:ख वाटे चावळावे, चघळती त्या बायका
चटके मनावर ओरखडे दाविती ना बायका..
*
ते रोज मरणे रोज जगणे मार बुक्यांचा बसे
लावूनी कुलूपे बसती त्या का करूनी घ्यावे वाटे हसे?
*
परी फुटतो बांध अवचित कधी पाणवठी वा वावरी
संताप होतो व्यक्त कृतीतून रडवेली होते, हासरी..
*
खोचून काचा साडीचा तो आपटून कापडे
साचलेला मळ निघतो मुखातून अंगार पडे..
*
बरसती अंगारासवे नयनातूनी लाह्या जणू
आसवे पाण्यात पडती सरिता सागरी जणू..
*
मोकळे मग आकाश होते पिळुनी आणखी मुक्तते
घेऊन उसना चेहरा मग ती घरी पुन्हा सामावते..
*
कधी न कळते अथवा वळते गेंडासमाजास ती
बंद ओठांवरही चालते रानटी मिजास ती…
*
वळकटी होते तिची मग करकचून ती बांधती
पेटत्या चितेत मग ती पूर्ण होते सारी रिती..
*
रानटी तो प्राक्तनाचा लिहिणारा धनी असे
काय जळते कोणाचे ते अनुभवावाचूनी ….
कळणार कसे? …. *
– प्रा. सौ. सुमती पवार नाशिक
कविता वाचल्यानंतर प्रथम डोळ्यासमोर येते ती संसाराचा गाडा निमुटपणे, विनातक्रार, कष्टाने, मानहानी सोसत ओढणारी एक ग्रामीण स्त्री! तिचं जग म्हणजे गावचा पाणवठा, नदीचा किनारा अन् तिथेच भेटणारी समदु:खी माणसं!
सुखदुःख वाटे चावळावे चघळती त्या बायका
चटके मनावर ओरखडे दाविती ना बायका
कशा असतात बायका! जरी कितीही वाटलं चुकतमाकत, तुटकपणे, अडखळत का होईना मनातलं खुपणारं जगाला सांगावं पण दुःख गिळण्याची सवय लागलेल्या या स्त्रिया स्वतःच्या मनावरचे चटके, ओरखडे लपवतच राहतात. आहे त्या परिस्थितीत जगत राहतात.
कवितेच्या या पहिल्या चरणात स्त्री कशी शोषित आहे याचं दर्शन होतं. *चावळावे* *चघळतती* हे शब्द तोच काव्यभाव अत्यंत परिणामकारक पद्धतीने व्यक्त करतात.
ते रोज मरणे रोज जगणे मारबुक्क्यांचा बसे
लावूनी कुलूपे बसती त्या करून घ्यावे वाटे हसे?
कधी शब्दांचा, कधी शारीरिक लाथा बुक्क्यांचा मार खात जगणं म्हणजे एक प्रकारचं रोजचं मरणच पण तरी “हाताची घडी आणि तोंडावर बोट” या पद्धतीने कुठेच व्यक्त व्हायचं नाही, बोलायचं नाही कारण बोललं, तक्रार केली तर त्यातून साधणार काहीच नाही. बदनामी मात्र होणार. हे कायमस्वरूपी भय उराशी बाळगतच ही अत्याचारित स्त्री जगत असते पण कधीतरी याचा स्फोट होतोच ना? अति होतं आणि बांध फुटतो. कसा? कशा रीतीने? त्याचं काळीज फाटणारं वर्णन कवयित्रीने पुढच्या चरणात केलं आहे.
तरी फुटतो बांध अवचित कधी पाणवठी वा वावरी
संताप होतो व्यक्त कृतीतून रडवेली होते हासरी..
गावात एखादा पाणवठा असतो. नदीचा किनारा असतो अथवा एखादं शेत असतं जिथे ती मोलमजुरी करते. ही सारी ठिकाणं म्हणजे तिच्यासाठी कधीतरी मन मोकळं करण्याची माध्यमं असतात. साऱ्याच पीडित असतात म्हणूनच एकमेकींची सुखदुःखं जाणू शकतात. रडवेली मनं मोकळी होतात. क्षणभर का होईना तिच्या मुखावर मग हास्य विलसते.
तिच्या मनातली खदखद, संताप कसा कृतीतून व्यक्त होतो त्याचं बोलकं चित्र सुमतीताई पुढच्या चरणात आकारतात.
खोचून काचा साडीचा तो आपटून कापडे
साचलेला मळ निघतो मुखातून अंगार पडे
ढीगभर धुणं घेऊन ती पाणवठ्यावर आलेली आहे. धुताना कपडे दगडावर आपटत असताना तिच्या मनातला संताप, उद्विग्नता तडतडणार्या ठिणग्यांप्रमाणे बाहेर पडते. जसा कपड्यातून मळ बाहेर येतो तसाच तिच्या मनातही कित्येक दिवस साठलेला मळ, कचरा बाहेर पडतो.
या चरणात “कापडं धुणं” हे अतिशय चपखलपणे रूपकात्मक पद्धतीने कवयित्रीने इथे मांडलं आहे. जशी एखादी पंचींग बॅग असावी.
स्त्री जीवनाशी निगडित असलेली ही रोजची सर्वसाधारण कृती तिच्या दुःखाला वाट फोडणारंं एक प्रभावशाली माध्यम कसं होऊ शकतं हे अत्यंत साध्या तरीही परिणामकारक शब्दात कवयित्री सुमतीताईंनी मांडलं आहे. हा चरण वाचताना अंगावर अक्षरशः शहरा येतो आणि कुठेतरी मनाला काटेही बोचतात.
बरसती अंगारासवे नयनातूनी लाह्या जणू
आसवे पाण्यात पडती सरिता सागरी जणू
मोकळे मग आकाश होते पिळुनि आणखी मुक्त ते
घेऊन उसना चेहरा मग ती घरी पुन्हा सामावते
एकीकडे ती आपटून धोपटून कपडे धूते, त्यातला मळ काढते आणि शेवटी ते घट्ट पिळते. ही प्रत्येक कृती प्रतिकात्मक आहे. तिच्या मनात साठलेला प्रचंड संताप, उद्रेक, चीड या प्रत्येक कृतीतून अगदी स्वाभाविकपणे बाहेर पडते. तिच्या मनात फुटणाऱ्या त्या संतप्त विचारांच्या लाह्या टणटणतात. तिच्या डोळ्यातून अश्रू ही ओघळत राहतात. वाहत्या पाण्यात तेही सामावून जातात. जशी नदी सागराला मिळावी त्याप्रमाणे. तिचे अश्रू त्या पाण्याशी एकरूप होतात. तो पाण्याचा प्रवाह तिच्या अश्रूंना उदरात घेतो. अशा रीतीने तीही मुक्त होते! मोकळी होते. ” झालं मोकळं आभाळ” अशी तिची हलकी मनस्थिती होते आणि मग ती पुन्हा तिचा तोच उसना हसरा चेहरा घेऊन घरी परतते.
या काव्यपंक्ती वाचताना वाचकांचे मन भळभळतं. इथे “स्वभावोक्ती” अलंकार अतिशय सुंदरपणे कवयित्रीने साधलेला आहे. पाणवठ्यावर धगधगणारं मन घेऊन कपडे धुणारी ही व्यथित ग्रामीण स्त्री अक्षरश: डोळ्यासमोर साकारते. आणि नकळत तिच्या डोळ्यातून ओघळणारे अश्रू आपण पुसावेत असे वाचकालाही वाटते.
कधी न कळते अथवा वळते
गेंडा समाजास ती
बंद ओठावरही चालते
रानटी मिजास ती..
वळकटी होते तिची मग करकचून ती बांधती
पेटत्या चितेत मग ती पूर्ण होते
सारी रिती…
समाज इतका बोथट, बथ्थड, संवेदन शून्य आहे की त्याला तिचं दुःख कळून घ्यायचंच नाही, कळलं तरी वळत नाही अशीच या भावना शून्य समाजाची स्थिती आहे. उलट स्त्री म्हणजे केवळ उपभोग्य वस्तू. तिला मन आहे, तिच्यात एक आत्मा आहे याची ना दखल ना जाणीव. काय होतं तिच्या साचून ठेवलेल्या यावेदनांचं? फक्त एक वळकटी. आयुष्य सरतं. अखेर करकचून बांधलेली वळकटी धगधगत्या चितेतच रिकामी, निवांत होते. आयुष्यभर जळणाऱ्या तिच्या दुःखाला मरण हाच एकमेव जणू आसरा असतो, थांबा असतो. तिच्या मरणातच तिची शांती असते.
रानटी तो प्राक्तनाचा लिहिणारा धनी असे
काय जळते कोणाचे ते अनुभवावाचूनी कळणार कसे
शेवटच्या चरणात मात्र हतबलता, हताशपणा जाणवतो. ज्या कुणाच्या गळ्यात ती तिच्या आयुष्याची माळ घालते तो तिचा धनीच तिचे भागधेय ठरवतो. तिच्या नशिबाची रेषा तोच आखतो आणि ती निमुटपणे, मिटल्या इंद्रियाने सारे स्वीकारते. तिच्या जळण्याने कुणाचे काही जळत नाही, बिघडत नाही. तिच्या दुःखापर्यंत खरं म्हणजे कोणीच पोहोचत नाही. ज्याचं जळतं त्यालाच कळतं. अनुभव नसलेल्यांना ते कसे जाणवणार? त्यांची फक्त वरवरची सहानुभूती असेल. त्यात थोडीच अंतःकरणाची तडतड असेल?
संपूर्ण मुक्तछंदातली ही कविता वाचल्यानंतर मन कमालीचं सुन्न होतं. या कवितेत एक उपहास आहे जो मन फाडणारा आहे. मात्र कवयित्री सुमती ताईंच्या प्रत्येक शब्दातून झिरपणारी तिची वास्तववादी व्यथा, “स्त्रीचं मन एक स्त्रीच जाणू शकते. ” या निष्कर्षापर्यंत नक्कीच आणून सोडते. शिवाय या कवितेतली वेदना, व्यथा मोठी की ती व्यथा जीवनभर सोसणारी सोशिक स्त्री मोठी हे ठरवता येत नाही पण तरीही या कवितेतून पाझरणारं जे स्त्रीरूप आहे ते कधी बदलेल का? बदलता येईल का? हा प्रश्न मात्र मनात उभा राहतो. कवितेतील गावकुसाकडची स्त्री समस्त पीडित नारीजातीचंच अशाप्रकारे प्रतिनिधीत्त्व करते.
☆ तुका म्हणे – दैव तुम्हां अवघें आहे… – अभंग रचना ☆ रसग्रहण – प्रा तुकाराम दादा पाटील ☆
☆ तुका म्हणे ☆
सदैव तुम्हां अवघें आहे /
हातपाय चालाया //१//
*
मुखी वाणी कांनीं कीर्ती /
डोळे मूर्ति देखावया //२//
*
अंध बहिर ठकलीं किती /
मूकी होती पांगुळ //३//
*
घरा आगी लावुनि जागा /
न पळे तो गा वांचेना //४//
*
तुका म्हणे जागा हिता /
कांहीं आता आपुल्या//४//
– संत तुकाराम.
*
तुका म्हणे
देवाने तुम्हाला चालता पळता यावे म्हणून हातपाय दिलेत. त्यांचा उपयोग करून तुम्ही स्वतःचालायला शिका.
तुम्हाला बोलता यावे यासाठी तूमच्या मुखात वाणी ठेवली आहे. तुमचीच कीर्ती ऐकण्यासाठी कानही दिलेले आहेत. आंधळे बहिरे पांगळे असे कितीतरी अभागी जीवही येथे आहेत. तेही जगतातच की. मग तुम्ही धडधाकट असूनही स्वतःच्या हिताचा विचार का करत नाही. तुम्ही जागे असतानाच तुमच्या स्वतःच्या घराला आग लावता आणि वाचण्यासाठी तेथून पळून ही जात नाही मग असा माणूस कसाकाय वाचेल बरं. अशा वेळी आपल्या हिताचा विचार करायला नको का? आपण स्वतः ज्या गोष्टी करत आहेत त्या आपल्या आणि आपल्या समाजाच्या हिताच्या नाहीत. आपल्या कुटुंबाच्या हिताच्या नाहीत हे तुम्हाला माहिती असूनही तुम्ही त्या का टाळत नाही. कारण आपण खोटया मोह मायेच्या जाळ्यात पुरते अडकून पडलेले असतो आणि जाणूनबुजून त्या गोष्टी करत बसतो. म्हणजे आपणच आपल्या घराला आग लावत असतो. घराला आग लागली आहे आता आपण आपल्याला वाचायला येथून दूर पळायला पाहिजे हे ठाउक असूनही आपण तसे करत नाही. आपण अशा चुकीच्या ब-याच गोष्टी जाणूनबुजून करत असतो. त्यांचा त्याग करत नाही. सारे काही माहिती असते पण मोह सोडवत नाही. असे जर वागलात तर शेवटी तुमच्या नशिबी कपाळमोक्ष येईल. म्हणून स्वताच्या हिताचा विचार करा. देवाने जे दिले आहे त्याचा उपयोग करा. सन्मार्गाला लागा. आणि नामसंकीर्तनात रंगून जा. तेच तुमच्या हिताचे ठरेल.
☆ तुका म्हणे – देखीचा दिमाख… – अभंग रचना ☆ रसग्रहण – प्रा तुकाराम दादा पाटील ☆
☆ तुका म्हणे ☆
*
देखीचा दिमाख शिकोनियां दावी /
हि-याऐसी केवीं गारगोटी//१//
*
मर्यादा ते जाणे अरे अभागिया /
देवाच्या ऐसिया सकळ मूर्ती//२//
काय पडिलासी लटिक्याचे भरी /
वोंवाळुनि थोरी परती सांडी//३//
*
तुका म्हणे पुढें दिसतसे घात /
करितों फजित म्हणउनि //४//
– संत तुकाराम.
*
तुका म्हणे
दुसऱ्याचे अनुकरण करून तसे वागण्याचा प्रयत्न करणाराला तुकाराम महाराज अनुभवाचे खडे बोल सुनावताना म्हणतात.
दुसऱ्याचे काही तरी शिकून आपणही तसे वागण्याचा खोटा खटाटोप करू नये. कारण कितीही मिजास दाखवली तरी गारगोटीला ही-याचे तेज येईल का? गारगोटी कधीच हि-यासारखी दिसणार नाही.
अभागी माणसाला मर्यादा कुठे, किती आणि कशा पद्धतीच्या असतात हेच कळत नाही. त्यांचा अंदाज घेता येत नाही. देवासारख्या दिसणा-या मूर्तीचे आपण दर्शन घेतो. तिच्यात प्रत्यक्ष देहधारी देव कधीच दिसणार नाही. ती फक्त मूर्तीच दिसेल. म्हणून आपण जे खोटे आणि प्रतिकात्मक आहे त्याच्या नादी कधीच लागू नये. त्याची खरी ओळख करून घ्यावी आणि आपल्या मनात त्याची जी भ्रामक ओळख आहे किंवा प्रतिमा तयार झाली आहे ती पुसून टाकावी. आपल्या पासून दूर करावी. आपण जर तसे केले नाही तर आपल्या जिवनात पुढे धोका होण्याचा संभव असतो. आणि मग पुढे जाऊन आपली फजीती देखील होऊ शकते. तसे होऊ नये म्हणून ख-या खोट्याची पूर्ण जाणकारी घेऊन कसे वागायचे ते ठरवायला पाहिजे. म्हणजे काहीच नुकसान होणार नाही.
☆ तुका म्हणे – कळेल हे खूण … – अभंग रचना ☆ रसग्रहण – प्रा तुकाराम दादा पाटील ☆
☆ तुका म्हणे ☆
*
कळेल हे खूण /
तरि दावी नारायण //१//
*
सत्य संतांपाशी राहे /
येरां भय आड आहे//२//
*
अणुचिया ऐसे /
असे भरले प्रकाशें //३//
*
इंद्रियांचे धनी /
ते हे जाती समजूनि //४//
*
तर्क कुतर्क वाटा /
नागवे घटापटा //५//
*
तुका म्हणे ल्यावें /
डोळा अंजन बरवे//६//
– संत तुकाराम.
*
तुका म्हणे
आपणास जे कळत नाही, ज्याची उकल होत नाही, काय करावे ते सुचत नाही अशावेळी ते जाणून घेण्यासाठी शांतचित्ताने आपण परमेश्वर चरणी लीन झाल्यावर, त्याची मनोभावे भक्ती केल्यावर परमेश्वर आपणास योग्य तो मार्ग दाखविल. अशावेळी नेमके काय करावे याच्या स्वानुभवाचे खरे सत्य ख-या संताजवळच आहे. इतरांजवळ त्यांचा स्वानुभव नाही. जो संत नाही त्यांच्याकडे भय भ्रमाचा घोटाळच साठलेला आहे. येवढे मात्र नक्की. इथे आपल्या अवतीभवती असणारा अणू रेणू ही परमेश्वरी परमतेजाने आणि प्रखर प्रकाशाने भारावून ठेवलेला आहे. पण ज्यांनी आपल्या इंद्रियांच्या अधीन न होता इंद्रियानाच आपल्या ताब्यात ठेवले आहे, त्यांच्या वर विजय मिळवला आहे असे जे जाणकार आहेत तेच हे सगळे समजून उमजून घेऊन वागतात. व योग्य ते मार्गदर्शन करतात.
पण जे कोणी ही वाट सोडून तर्क कुतर्कांच्या मागे धावतात तेथे सगळ्याच भल्याभल्यांना ही नागवले जाते. फसवले जाते. हे कळण्यासाठी व जाणून घेण्यासाठी आपण आपल्या डोळ्यात भक्तीचे अंजन घालून त्याच्याकडे पाहिले तरच आपल्याला सारे कळून येईल. अन्यथा आपण ही भ्रमातच गुरफटले जाऊ. या अभंगातून तुकाराम महाराजांनी संतसहवासात राहिल्याने आपल्याला काय मिळेल ते स्पष्ट केले आहे. आणि ख-या भक्तीचा अगदी सरळ सोपा मार्ग ही दाखवून दिला आहे. सर्व सामान्य माणसाने याच मार्गाचा अवलंब करून परमेश्वराची भक्ती करावी असे सांगितले आहे.
☆ तुका म्हणे – उचित ना कळे… – अभंग रचना ☆ रसग्रहण – प्रा तुकाराम दादा पाटील ☆
☆ तुका म्हणे ☆
*
उचित न कळे इंद्रियाचे ओढी /
मुखे बडबडी शिकलें तें //१//
*
आपण जाऊन न्यावें नरकास /
फळे बेताळीस कुळें जग //२//
*
अबोलणें बोले डोळे झांकुनियां /
बडबडी वांयां दंभासाठीं //३//
*
तुका म्हणे आम्ही तेथील पारखी /
नाचे देखोवेखी जाणों खरे //४//
– संत तुकाराम.
*
तुका म्हणे
माणसाला इंद्रिय सुखाची अनावर ओढ लागल्यामुळे आपल्या साठी योग्य काय आहे अयोग्य काय आहे याचे भानच उरत नाही. पण तो जे शिकलेला आहे ते मात्र तोंडाने केंव्हाही आणि काहीही बडबडत रहातो आपले डोळे झाकून भान हरपून जे बोलणे अयोग्य आहे ते ही बोलत सूटतो. तेव्हा बोलताना त्यांची होणारी केविलवाणी स्थिती बघण्या सारखी होते. पण जाणकारांना या सगळ्याची खरी पारख आहे. कोण वरवरचे बोलत कसा नाचत आहे तो मनोमन जाणत़ो.
माणूस इंद्रिय सुखाच्या आधीन होतो. आहारी जातो, तेव्हा तो आंधळा झालेला असतो. आपण जे करतोय ते आपल्या हिताचे आहे की अहितकारक आहे हे त्याला कळतच नाही. हे सर्व जाणून घेवून ही माणूस वायफळ बडबड करत सुटतो. कारण आपण चारबुके शिकलेलो आहोत याचा त्याला इतरांपढे टेंभा मिरवायचा असतो. म्हणूनच तो जे बोलणे योग्य नाही ते ही बोलत रहातो. आणि आपल्या इंद्रियसुखाची नको तितकी भलावण करून घेतो. पण खरोखरचा ज्ञानी माणूस हे सर्व सहजपणे ओळखतो. त्याला ख-याखोट्याची पूर्ण जाणीव होते. समोरचा माणूस फक्त वरवरच्या कोलांट्या मारत आहे हे त्याला कळते. पण अशा बेजबाबदार वागण्याने आपणच आपली इज्जत घालवून घेत आहोत हे मात्र बडबडनाराला कसे कळत नाही बरे.
☆ तुका म्हणे – बरे झाले आली ज्याच्या त्याच्या घरा… – अभंग रचना ☆ रसग्रहण – प्रा तुकाराम दादा पाटील ☆
☆ तुका म्हणे ☆
*
बरे झालें आलीं ज्याचीं त्याच्या घरा /
चुकला पान्हेरा ओढाळांचा //१//
*
बहु केलें दु:खी त्याचिया सांभाळे/
आतां तोंड काळे तेणें लोभें //२//
*
त्यचिया अन्यायें भोगा माझे अंग /
सकळही लाग घ्यावा लागे//३//
*
नाही कोठें स्थिर राहो दिलें क्षण/
आजिवरि सिण पावलों तो //४//
*
वेगळल्या खोडी केली तडातोडी /
सांगावया घडी नाहीं सुख //५//
*
निरवूनि तुका चालिला गोवारें /
देवापाशी भार सांडवूनि //६//
*
– संत तुकाराम.
*
तुका म्हणे
तुकाराम महाराज या अभंगात परमेश्वरानी आपल्याला दिलेली इंद्रिये, आणि त्याना दिलेली शक्ती व बुद्धी याच्या विषयी सांगत आहेत. देवाने मला दिलेल्या या नाठाळ इंद्रियांचा संग आता संपला. ही सगळी देवानेच मला दिली होती. ती मी ज्यानी मला दिली होती त्याच्या घरी पोहचवली. मी त्यांचा लोभचं सोडून दिला आहे. त्यांनी आपापले तोंड काळे करून माझ्यापासून दूर जायचे ठरवले आहे. त्यांनी माझ्यावर खूप अन्याय केले. पण त्याचे सारे भोग मात्र माझ्या देहाला भोगावे लागले. मला त्यांनी कोठेही स्थिर होवू दिले नाही. आजवर त्यानी मला खूप त्रास दिला. क्षणभराचीही कधी विश्रांती घेवून दिली नाही. त्याचा मला खूप शिणवटा झाला आहे. मी त्यांचा सांभाळ केल्यानेच त्यांनी अनेक खोड्या केल्या. माझ्या जगण्याची तोडफोड करून त्याची वाट लावली. कुणाला सांगण्या पुरतेही सुख त्यांनी माझ्याजवळ ठेवले नाही. आता मीच ह्याचा सहवास संपवण्याचा विचार करून त्यांना देवाकडे परत करून मोकळा झालो आहे. यातून बाहेर पडलो आहे.
देवाने अनेक इंद्रिये दिली. त्याना चालवण्याची बुद्धीही देवानेच दिली. पण मला हे कळले की हे सर्व देवाचेच आहे. मग मी त्यांचा अवखळपणा ओळखून, त्यांचा हुडपणा पाहून ते सर्व ज्याचे त्याला म्हणजे परमेश्वरालाच देवून टाकले. पण हे माझ्या ध्यानी येईपर्यंत त्यानी मला फार भंडावून सोडले. त्यांचा मोहाने सांभाळल्या मुळेच किती तरी दु:खे मला भोगावी लागली. त्यांच्या मुळेच माझ्या कडे पापे जमा होते गेली. किती तरी चांगल्या गोष्टींची ताटातूट झाली. मला क्षणभर सुद्धा शांतपणे जगता आले नाही.
आता मला सारे काही कळून चुकले आहे. म्हणून देवाने मला जे जे दिले होते ते सर्व देवांचे देवालाच देऊन मोकळा झालो आहे. म्हणूनच मला आता कसलीच अडचण उरली नाही.
☆ तुका म्हणे – पडिलो भोवनी… – अभंग रचना ☆ रसग्रहण – प्रा तुकाराम दादा पाटील ☆
☆ तुका म्हणे ☆
*
पडिलों भोवनीं
बहु चिंतवणी //१//
*
होतो चुकलो मारग /
लाहो केला लागवेग //२//
*
इंद्रियांचे संधी /
होतो सापडलो बंदी //३//
*
तुका म्हणे बरे झाले/
विठ्ठलसें वाचे आले //४//
*
– संत तुकाराम.
*
तुका म्हणे
मी जन्म घेतला तेव्हापासूनच संसाराच्या भोव-यात अडकून पडलो होतो. खूप अडचणीत अडकलो होतो. खरे तर मी निवडलेला माझा रस्ताच चुकला होता.
मी मग लगबग करून तो बदलूनच टाकला. इंद्रिय सुखाच्या जाळ्यात अडकल्यामुळे मी तिथेच पुरता बंदिवान झालो होतो. गुरफटून गेलो होतो. पण मग अचानक पुढे विठ्ठलाचे नाव माझ्या मूखी आले.मी त्याच्या नामाचा नामघोष चालू केला आणि त्या जंजाळातून माझी सुखरूप सुटका झाली.हे खूप बरे झाले.
प्रपंच करताना सतत येणा-या अडचणीतून कुणाची कधीच सुटका होत नाही. त्या अडचणी कुणालाही टाळता येत नाहीत.त्या मुळे संसारात गुंतलेला माणूस सतत चिंताग्रस्त असतो.त्या मुळेच तो इंद्रिय सुखाच्या मागे लागतो आणि तेथेच कायमचा गुंतून पडतो.पण जेव्हा असे होवू लागते तेव्हा आपला रस्ता चुकला आहे हे त्याच्या ध्यानात यायला पाहिजे. आपण प्रापंचिक चिंतेतच गुंतून पडलोय, इंद्रिय सुखाच्याच मागे धावतोय हे काही बरे नाही असे वाटायला पाहिजे. यातून आपण बाहेर पडण्यासाठी धडपड केली पाहिजे हे सुचले पाहिजे. अशावेळी शांतचित्ताने मुखाने विठ्ठलाचा नामघोष केला तरी पुरेसे आहे. केवळ तसे केले तरी या सतावणा-या चिंतेत पासून आपली मुक्तता होईल. आणि मुक्तीचा सन्मार्ग आपल्याला नक्कीच सापडेल. पण त्यासाठी प्रबळ इच्छा शक्ती मात्र निर्माण करायला हवी. सामान्य माणसाला येवढे करणे सहज शक्य आहे. असे तुकाराम महाराज येथे सांगतात.