मराठी साहित्य – काव्यानंद ☆ मावळतीवर… कवी : डॉ. निशिकांत श्रोत्री ☆ रसग्रहण – नीलिमा खरे ☆

नीलिमा खरे

? काव्यानंद ?

☆ मावळतीवर… कवी : डॉ. निशिकांत श्रोत्री ☆ रसग्रहण – नीलिमा खरे ☆

प्रत्येक आरंभाचा अंत निश्चित, अटळ व अनिवार्य आहे. किंबहुना ते त्याचे प्राक्तनच असते म्हणा ना ! अर्थात जो उगवतो ,उदय पावतो तो मावळतो. जो जन्माला येतो त्याचे मरण अटळ असते.अशा प्रकारे उदय -अस्त व जन्म -मरण हे चक्र सृष्टीत, चराचरात अव्याहतपणे चालू असते .जातस्य हि ध्रुवो मृत्यु: हे संस्कृत वचन सारे जण जाणतो.तो निसर्गाचा नैसर्गिक नियमच आहे हे आपणास ज्ञात आहे. या जगात कोणीही अविनाशी ,अमर नाही. मात्र जेव्हा या जाणीवेचा, भावनेचा जगण्याशी ,आयुष्याशी संबंध जोडला जातो तेव्हा मन कातर होते. अनामिक भयाचे भय अंतरी दाटून येते. कळीकाळाचे कालातीत भय काळजाला वेदना देवून त्याला उदासीन बनवते. इथे एक गोष्ट आवर्जून नमूद करायला हवी की अशा प्रकारे अंताच्या नियमाला अपवाद नसला तरी अंताकडे कसे पाहावे , त्या संदर्भात दृष्टिकोन कसा ठेवावा हे ज्याच्या त्याच्या व्यक्तिगत जाणीवांवर व नेणीवांवर अवलंबून आहे.विचारशक्ती, बुध्दिमत्ता यांना वास्तव भावनेची जोड असेल तरच हे जमू शकते. अंत या संकल्पनेकडे तटस्थ बुद्धीने पाहणे व सत्याच्या जाणिवेचे आकलन झाल्याने तिचे भान ठेवणे शक्य होते. प्रत्यक्ष मरणापेक्षाही “पॅसेज टू डेथ “हा माणसाला जास्त भिवविणारा व घाबरवणारा असतो.आयुष्याच्या या प्रवासाकडे सजगतेने पाहणे , विचार करणे व तसे आचरण करणे यासाठी माणूस वेगळ्या मुशीचाच असावा लागतो असे म्हटले तर वावगे ठरू नये . माणूस मावळतीवर जरी आला तरी असा वेगळा दृष्टिकोन व विचार जाणीवपूर्वक विकसित केला तर तो स्वतःचे आयुष्य समाधानी वृत्तीने जगू शकतो.सर्वांना आपल्याशा आणि जवळच्या वाटणाऱ्या या विषयावरची डॉक्टर निशिकांत श्रोत्री यांच्या “मावळतीवर” या कवितेचा आज रसास्वाद घेऊ या.

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

मावळतीवर ☆

निसर्गाने नेमलेल्या नियमांनी

नियतीने आखून दिलेल्या चाकोरीत

आयुष्याने नेलेल्या मार्गावर

जीवनक्रमण करत आलो

विहित कर्मे समर्पित निरपेक्ष बुद्धीने करता करता

मावळतीच्या क्षितिजासमीप

नकळतच येऊन पोहोचलो

*
उगवतीच्या कोवळ्या उन्हाचे

मध्यान्हाला झालेले रणरणते ऊन

हळू हळू कसे क्षीण होत गेले

मावळतीच्या क्षितिजावर

समजलेच नाही

*
तरीही याच लोभसवाण्या

भेडसावणाऱ्या मावळतीच्या क्षितिजावरून

हातून सुटलेले कित्येक छंद

जाणवतायत मोहकशी साद घालतांना

माझ्यातल्या लपलेल्या कौशल्यांना

उदयोन्मुख व्हायचे आव्हान देतांना

किती आतुरतेने

*
तिन्हीसांजेला उषःकालासाठी

मध्यरात्रीला भेटावेच लागेल

निसर्गाचे हे चक्र

उलटे कसे फिरेल माझ्यासाठी

पुन्हा उदयाची आंस असली तरी

परतीचा मार्ग

केव्हाच बंद झाला आहे

*
पुन्हा प्राचीवर यायला

मावळतीच्या क्षितिजा पलीकडे

बुडी मारायलाच हवी

पश्चिमेला मावळायालाच हवे

अस्त करून घ्यायलाच हवा.

©️ डॉ. निशिकान्त श्रोत्री
एम.डी., डी.जी.ओ.

रसग्रहण: मावळतीवर

निसर्गाने नेमलेल्या नियमांनी

नियतीने आखून दिलेल्या चाकोरीत

आयुष्याने नेलेल्या मार्गावर

जीवनक्रमण करत आलो

विहित कर्मे समर्पित निरपेक्ष बुद्धीने करता करता

मावळतीच्या क्षितिजासमीप

नकळतच येऊन पोहोचलो

यथार्थ व अत्यंत समर्पक काव्य शीर्षक देण्याचे डॉक्टर निशिकांत श्रोत्री यांचे साहित्यिक भान व कसब या कवितेच्या शीर्षकातही जाणवते. कवितेच्या अंतरंगाकडे व आशयाकडे हे काव्यशीर्षक सुस्पष्टपणे निर्देश करते. “मावळतीवर” या काव्यशीर्षकातून काव्यवाचकांना साधारणतः या कवितेतील व कवितेचा विषय लक्षात येतो . त्यासाठी आवश्यक असलेली मानसिकताही तयार होते व त्याचे शब्दरूप व भावरुप जाणून घेण्याची उत्कंठा प्रकर्षाने होते.

अंत,शेवट हा जरी अटळ असला तरी त्याचीही एक प्रक्रिया आहे. उदय हा अस्त होण्याआधी मावळतीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपतो. निसर्गातील ही बाब अतिशय सहजगत्या घडताना दिसते.हा संध्यासमय ,ही कातरवेळ नेहमीच मनाला स्पर्शून जाणारी असते कारण यावेळची भावावस्था काहीशी उदासीन, निराशाजनक होते. अशा परिस्थितीत व याच वेळेला अत्यंत विचारपूर्वक वागणे गरजेचे असते. निसर्गाचे रूपक घेऊन कवी हीच भावना आयुष्य जगताना ही अशाच प्रकारे जतन करावी हा संदेश सांकेतिक स्वरूपात देत आहे . आयुष्याच्या या टप्प्यावर कसे आचरण असावे याचा वस्तुपाठ देणारी ही कविता आहे.

मनात उदासीन भावनांना थारा न देता सकारात्मक विचार जपणे, जोपासणे गरजेचे असते. कवीच्या मनात या संदर्भात जे काही भावभावनांचे तरंग उमटले आहेत ते कवीने शब्दांकित केले आहेत. स्वतःच्या आयुष्याचा पट स्पष्टपणे मांडलेला दिसून येतो .कवी खरोखरच अशा पद्धतीने जगला आहे.ही केवळ कवी कल्पना वा कल्पनेचे मनोरे नाहीत तर त्याला वास्तविक सत्याचा स्पर्श झालेला आहे.

निसर्गाने नेमलेल्या नियमाने व नियतीने आखून दिलेल्या चाकोरीत कवीने आपल्या आयुष्याची मार्गक्रमणा केली आहे. असे करताना कधीच ,कुठल्याही प्रकारे का , कधी , केव्हा , कसे अशा पद्धतीचा विचारही त्याच्या मनाला शिवलेला नाही. अतिशय सहजतेने जीवनाची ही वाट त्यांनी अंगीकारलेली आहे व त्यावर वाटचाल केलेली आहे.नियतीने ,प्राक्तनाने अर्थात विधिलिखित असलेली कर्मे करणे व तसे करताना संपूर्ण समर्पित भावना व निरपेक्ष बुद्धी निरंतर जपणे हे सत्य मांडले आहे . विहित कर्मे ही पूर्णपणे पूर्वसंचितानुसार प्राक्तनी लिहिलेली असतात.ही सर्व कर्मे करत करत आता कवी मावळतीच्या समीप येऊन पोहोचलेला आहे. ही गोष्ट अगदी सहजपणे त्याच्याही नकळत घडून गेलेली आहे हेही स्पष्ट केले आहे. अशी ही सहज नैसर्गिक भावना जपणे ,जाणणे हे शक्य आहे हे स्वतःच्या आचरणातून जाणवून दिलेले आहे. निसर्गाच्या नियमांचे उल्लंघन करणे शक्य नाही व तसा विचार व्यावहारिक ही नाही हे जाणून घेणे आवश्यक आहे. नियम पाळताना त्याला मनाने ,अंतर्गत विरोध केलेला नाही. प्रत्यक्षात,वास्तवात तर नाहीच नाही. त्यांचे काटेकोर पालन करून नियतीने दिलेल्या प्रत्येकाच्या आयुष्याची चाकोरी असते ती स्वीकारून जीवनक्रमणा केली असे म्हणताना ती आयुष्याने केली असे म्हटले आहे. इथे साधलेला हा चेतना गुणोक्ती अलंकार अतिशय समर्पक आहे. जे काही केले, घडले यात “मी” पणाचा अजिबात लवलेश नाही.यामुळे कवीच्या मनातील निरपेक्ष भावना ठळकपणे लक्षात येते.कवीने नियतीप्रती पूर्णतः समर्पित भावना व्यक्त केली आहे. व असे करताना कर्माप्रतीची प्रीती व श्रद्धा जाणीपूर्वक जपली व जोपासली आहे.

भारतीय संस्कृती व परंपरेनुसार आश्रम व्यवस्था मानण्यात आली आहे.

ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ व संन्यास हे चार आश्रम मानवजातीच्या जगण्यातील चार महत्त्वाचे टप्पे मानले आहेत.प्रत्येक टप्प्यावर त्या समयी कोणती कर्तव्ये उचित व अपेक्षित आहेत यासंबंधी मार्गदर्शन केले आहे.बालपण ,तारुण्य , गृहस्थाश्रम आणि जरा अर्थात म्हातारपण हा आयुष्याचा जीवनक्रम जसा आला तसा कवीने स्वीकारला आहे . या कवितेत मांडलेला विचार हा संन्यासाश्रमाच्या मुक्कामी पोहचल्यावर पार केलेल्या आधीच्या तीन आश्रमाचे सिंहावलोकन आहे.त्यावर टाकलेला सहेतुक दृष्टिक्षेप आहे.चाकोरी या शब्दावरील श्लेषात्मक अर्थ अतिशय यथार्थ आहे.या शब्दातून जीवनाच्या या चार अवस्था ,हे चार आश्रम व त्यातील सर्वांच्या बाबतीत असलेली समानता सूचित केली आहे. यात कोणाच्याही बाबतीत कसलाही बदल होत नाही या अर्थाने हे चाकोरीबद्ध आयुष्य असा भावार्थ अपेक्षित आहे. तसेच ही चाकोरी नियतीने आखून दिलेली आहे. त्या अंतर्गतच आयुष्य सीमित आहे, मर्यादित आहे हे लक्षात आणून दिले आहे.

“जीवनक्रम” यामधील श्लेष ही अतिशय सुंदर आहे.जीवनाचा क्रम आणि ज्या क्रमाने तो येतो तो भाव जाणून तसे जगणे , मार्गक्रमणा करणे हे दोन्ही अर्थ अभिप्रेत आहेत. अतिशय मार्मिकतेने व तितक्यात सहजतेने कवितेचा भाव जपून कवितेतील आशय वृद्धिंगत केला आहे.”विहित”या शब्दातून अपेक्षित तसेच शास्त्र व समाज यांनी मान्य केलेली आणि मनाने निर्धारित केलेली कर्मे करणे हा विचार सुस्पष्टपणे व्यक्त केला आहे. तसेच पूर्व संचिताकडे निर्देश केला आहे.

कवीने कुठल्याही अनैतिक वा गैरमार्गाचा वापर व तशी कृत्ये केलेली नाहीत हा गर्भितार्थ लक्षात येतो. कुठल्याही प्रलोभनांशी हात मिळविणी केलेली नाही. नैतिकतेशी समझोता केलेला नाही.नैतिकता व सद्सदविवेक बुद्धीला स्मरून,जागून सरळ मार्गाने जीवनक्रमणा केली. एवढेच नव्हे तर असे आचरण करताना निरपेक्ष बुद्धीने त्यांच्या फळाची अपेक्षा न ठेवता श्रद्धापूर्वक आयुष्य जगण्याचा सफल प्रयत्न केलेला आहे.”इदम न मम” तसेच “कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन”ही श्रीभगवद्गीतेतील भगवान श्रीकृष्णाची शिकवण ग्राह्य धरून, अंगीकारून तसे आयुष्य जगण्याचा प्रयत्न नक्कीच केला आहे. केलेल्या कर्माची फळे स्वतः करता आहेत,असतात अशी अपेक्षा केली नाही व ती समाजाप्रती, ईश्वराप्रती समर्पित केली. आणि अशा तऱ्हेने अतिशय उच्च दर्जाचे श्रद्धापूर्ण व कर्माधिष्ठीत जीवन जगता जगता मावळतीच्या क्षितिजापर्यंत म्हणजेच जीवनाच्या संध्यापर्वात कवीने प्रवेश केला आहे. मावळतीच्या उंबरठ्याची समीपता कवीला कळाली आहे हे सूचित केले आहे. अर्थात हे सारे अगदी सहजगत्या घडले आहे, निसर्ग नियमानुसार घडले आहे हा भाव व्यक्त केला आहे. मावळती म्हणजे पश्चिम दिशा, ज्या दिशेला सूर्य अस्त पावतो. क्षितिज हे असीम ,अमर्याद, अथांग, अज्ञात आहे. अशा या क्षितिजाची समीपता जाणवल्याने सहजपणे त्याच्याही नकळतच वास्तवाची जाणीव झालेली आहे. अत्यंत सहजतेने अत्यंत मनःपूर्वक व रूपकात्मक पद्धतीने निसर्ग नियमानुसार , नियतीने आखून दिलेला जीवनक्रम व तसे विहित कार्य करणे हा अतिशय महत्त्वाचा मानवधर्म कवीने अंतःकरणापासून निरंतर जपला आहे. व त्यानुसार जगण्याचा प्रामाणिक, प्रांजल प्रयत्न केलेला आहे.

या कवितेचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे ती मुक्त छंदात रचलेली प्रथम पुरुषी एकवचनी कविता आहे.निसर्गाने नेमलेल्या नियमांनी यामधील अनुप्रास अतिशय लोभस आहे. यथोचित उपमा ,रूपके , श्लेष व चेतनागुणोक्ती यांची अर्थपूर्ण मांडणी कवितेतील आशय मनावर पूर्णपणे ठसविण्यात यशस्वी होते. कवितेतील भावनेला सुयोग्य ,समर्पक साहित्यिक अलंकारांचा साज सुशोभित करतो. व असे करताना त्यातील सुलभपणा जपलेला जाणवतो. साहजिकच यातून कवीचा विचारातील प्रामाणिकपणा, प्रांजळपणा व विषयाशी असलेली बांधिलकी प्रकर्षाने लक्षात येते.

उगवतीच्या कोवळ्या उन्हाचे

मध्यान्हाला झालेले रणरणते ऊन

हळू हळू कसे क्षीण होत गेले

मावळतीच्या क्षितिजावर

समजलेच नाही

“मावळती” ही या कवितेची मुख्य कल्पना व संकल्पना आहे . तदनुषंगिक झालेला, घडलेला आयुष्याचा प्रवास समांतर पद्धतीने या कवितेत शब्दबद्ध केलेला आहे. साहजिकच सूर्याचे उगवल्यानंतरचे हवेहवेसे वाटणारे कोवळे ऊन, त्याचा सोनसळी स्पर्श, त्याची चमक मनाला मोहून टाकते तसेच जीवनाचे झालेले आहे. सुंदर हवेहवेसे वाटणारे साजिरे बालपण सुखात ,आनंदात व्यतीत होते. आयुष्यातील नानाविध क्षेत्रे खुणावत असतात. जीवन हे मोहक आहे असे वाटू लागते. अर्थात ते तसे आहे ही.परंतु तेव्हा जीवनातील संकटांचा, अडचणींचा सामना करावा लागतो ही भावना बालमनाला माहीतच नसते .तारुण्य आणि गृहस्थाश्रम यात पदार्पण केल्यानंतर मात्र त्या भवसागरातील अडचणींचा, समस्यांचा ,आपदांचा ,विपदांचा सामना करणे अटळ ठरते आणि या सर्वांची तुलना मध्यान्हीच्या रणरणत्या उन्हाशी केलेली आहे. अतिशय सुयोग्य, अर्थवाही व अर्थपूर्ण रूपकातून ही भावना व्यक्त केली आहे. सूर्याच्या सुरुवातीच्या कोमल , उबदार, आश्वासक स्पर्शानंतर त्याचे मध्यान्हीचे ऊन भोगणे क्रमप्राप्तच असते. सूर्योदयानंतर साऱ्या चराचराला जगण्याची प्रेरणा व चेतना मिळते हीच भावना आयुष्याच्या सुरुवातीला असते. जसजसा सूर्य माथ्यावर तळपू लागतो व त्या बरोबरीनेच आयुष्य ही चालू राहते तेव्हा त्याची दाहकता ,धग, झळ ,अफाट व अटळ असते. ती सोसणे , अनुभवणे याला तरणोपाय नाही. चढल्यानंतर उतरणे क्रमप्राप्त आहे. जीवनाची उन्नत व प्रगत अवस्था उपभोगल्यानंतर शारीरिक दृष्टीने आयुष्य उतरणीला लागते . सूर्याची मध्यान्हीची सर्वात उंच अवस्था हळूहळू लोप पावू लागते. त्यातली दाहकता, त्याचे तेज, त्याचा तेजस्वीपणा हळूहळू क्षीण होत जातो.जोश , उत्साह व त्याची प्रभा क्षीण होत होत,मंदावत संपूर्णपणे समाप्तीच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचते. हे सर्व होताना नेहमीप्रमाणेच सूर्यास्त होतो आणि तो क्षितिजापार अंतर्धान पावतो हे मानवी मनाने सहजपणे स्वीकारलेले आहे. किंबहुना त्याकडे एखादी वेगळी घटना म्हणूनही पाहिले जात नाही, ती अत्यंत नैसर्गिक बाब आहे हे मनाने जाणून घेतलेले आहे. तद्वतच आयुष्याचे मावळतीवर येणे ही भावनाही अत्यंत सहज व नैसर्गिक आहे हे कवीने लक्षात आणून दिले आहे. या सर्व घटना नकळतच सहजरीत्या घडत असतात त्यामुळे त्याची जाणीव मनाला त्या स्थितीपर्यंत आल्यानंतरही सहजपणे ध्यानात येत नाही. ही कविता मुक्तछंदातील असूनही त्यातील लय व नाद कवीने जपलेला आहे त्यामुळे ती कुठेही क्लिष्ट वाटत नाही .तिला गेयतेचा सुंदर स्पर्श झालेला आहे.

तरीही याच लोभसवाण्या

भेडसावणाऱ्या मावळतीच्या क्षितिजावरून

हातून सुटलेले कित्येक छंद

जाणवतायत मोहकशी साद घालतांना

माझ्यातल्या लपलेल्या कौशल्यांना

उदयोन्मुख व्हायचे आव्हान देतांना

किती आतुरतेने

काही अंशी नव्हे खरे तर बऱ्याच प्रमाणात व तीव्रतेने भेडसावणारी व त्यामुळे मनाला उदासीन बनवणारी अवस्था सामोरी ठाकली असतानाही कवीला मात्र ती जाणीव मनात असूनही विविध सकारात्मक भावना साद घालत आहेत.

लोभसवाणा हा अत्यंत सुंदर शब्दयोजून हवाहवासा ,त्याकडे खेचणारा ,आकृष्ट करणारा, आमंत्रण देणारा असा अपेक्षित भाव अतिशय सुंदर पद्धतीने व्यक्त केलेला आहे.आयुष्याच्या क्षितिजावर प्रसन्न आभा पसरलेली आहे आणि हातातून निसटून गेलेले क्षण काही छंद मन कातर करत आहेत. मावळण्याची हुरहुर आहे व “संध्या छाया भिवविती हृदया” अशी मनाची भावावस्था झालेली आहे.

भेडसावणारा हा ही अत्यंत अर्थवाही शब्द आहे. त्यात लपलेल्या विविध छटा कवितेतील आशयाला पूरक आहेत .घाबरवणारा ,दहशत घालणारा, भीती देणारा, भिवविणारा ,धमकी देणारा असे विविध भाव या एका शब्दातून आपल्याला समजतात.त्याबद्दल कवीच्या मनात कुठलाही त्रागा, खंत ,खेद वा दुःख नाही. उलट पक्षी हे मावळतीचे क्षितिज त्याला लोभसवाणे वाटते आहे.मनातली उमेद अजूनही ताजीतवानी, जागी व सक्षम ही आहे. सुटून गेलेली, राहिलेली, कालौघात ,जीवनाच्या रहाटगाडग्यात,संसारात व व्यवसायात गुरफटल्याने समाजास दृगोचर न झालेली, दृष्टीस न पडलेली ,संधी न मिळाल्याने प्रगट न झालेली कौशल्ये त्याला खुणावत आहेत. उदयोन्मुख या शब्दातूनही प्रथम

प्रादुर्भूत होणारे ,अस्तित्वात येणारे, दिसणारे ,विकसित होणारे या अर्थाच्या सर्व अपेक्षित छटा अधोरेखीत होतात. छंदांवषयी त्याच्या अंतरंगातली ओढ त्याला जाणवते आहे. अर्थात ते राहिले म्हणून त्याला वाईट अजिबात वाटत नाही. कारण त्यावेळी मनापासून स्वीकारलेल्या पेशाप्रती शंभर टक्के योगदान देण्याचा त्याचा प्रयत्नही तितकाच प्रांजळ व मनापासूनचा होता. त्यामुळे काही “सुटून गेल्या” मधील खेदाचा भाव अजिबात मनात बाळगलेला नाही. साहजिकच या भेडसावणाऱ्या क्षितिजाला घाबरून न जाता त्यातील लोभसपणाकडे आकर्षित होऊन कवीच्या मनात अजूनही काही ठोस,भरीव कामगिरी करण्याची भावना आहे. व्यावसायिक पेशातील कार्यबाहुल्यामुळे व व त्या प्रती अतिशय समरसून काम करताना वेळेअभावी जपता न आलेले , सुटून गेलेले अंतरीचे छंद त्याला मोहकशी, मोहात पाडणारी साद घालत आहेत. शारीर अवस्थेपेक्षाही प्रबल असलेली ही भावनिक अवस्था जपणे व जाणणे ही अतिशय कौतुकाची बाब आहे.अंगातील विविध कला कौशल्य उदयोन्मुख होण्यासाठी, उदयास येण्यासाठी त्याला नुसती खुणावत नाहीत तर आव्हान देत आहेत. ही कला कौशल्ये आत्मसात करून त्यांच्यातही कसब प्राप्त करणे हे अजूनही शक्य आहे ही भावना खूप महत्त्वाची आहे आणि हे सर्व काही अतिशय आतुरतेने , आनंदाने घडत आहे. साहजिकच जीवनातील विविध अंगांचा, अंगातील सुप्त कलागुणांचा पाठपुरावा करणे हा मोह व त्याचे आकर्षण कवीला या वयातही पडत आहे. मावळतीच्या उंबरठ्यावर असतानाही अस्ताची भीती न बाळगता या भेडसावणाऱ्या क्षितिजापलीकडील वेगळेच क्षितिज त्याला साद घालत आहे. आव्हाने पेलण्याची त्याची मानसिक ताकदही अजून अस्तित्वात आहे, शिल्लक आहे हे लक्षात येते.

तिन्हीसांजेला उषःकालासाठी

मध्यरात्रीला भेटावेच लागेल

निसर्गाचे हे चक्र

उलटे कसे फिरेल माझ्यासाठी

पुन्हा उदयाची आंस असली तरी

परतीचा मार्ग

केव्हाच बंद झाला आहे

तिन्ही सांज अर्थात कातरवेळ येऊन ठेपलेली आहे. या समयी साधारणत: सूर्यास्ताची वेळ असते .सकाळ व दुपार हे दोन समय सरून गेलेले असतात. व रात्रीच्या पर्वाला सुरुवात होण्याआधीचा हा तिसरा समय म्हणून त्यास तिन्ही सांज संबोधतात. हेच कालचक्र माणसाच्या आयुष्याशी निगडित आहे.

यथावकाश अंताकडे वाटचाल होणार आहे .उत्पत्ती नंतर लय व लयानंतर उत्पत्ती या नियमानुसार रात्री नंतर येणाऱ्या उषःकालासाठी रात्रीला नव्हे तर मध्यरात्रीला म्हणजे रात्रीच्या परमोच्च बिंदूलाही आता भेटावेच लागणार आहे. रात्रीची नुसती सुरुवात होऊन उपयोग नाही तर तिचा चरमबिंदू साधला गेल्यानंतरच उषेचे सोनेरी सुप्रभातीचे सत्य प्रत्यक्षात येणार आहे. मध्यानंतर परत सामोऱ्या येणाऱ्या उतरत्या किंवा चढत्या अवस्थेला सामोरे जावे लागते ,त्या अवस्थेतून भ्रमण करावे लागते. निसर्गाचे हे चक्र नियमित व अटळ आहे. निसर्गाचा हा नियम पाळल्यानंतरच ते निसर्गाचे चक्र त्याने घालून दिलेल्या चाकोरी प्रमाणे चालू राहणार आहे. साहजिकच कवी म्हणतो की केवळ माझ्यासाठी हे निसर्गाचे चक्र उलटे कसे फिरेल ,अर्थातच ते फिरणार नाही याची जाणीव त्याला मनोमन आहे.. उदयाची आस कितीही तीव्र व खरी असली तरी त्या साचेबद्ध चाकोरीतून गेल्याशिवाय म्हणजेच अस्ताविना परत उदयाला येणे, अस्तित्व लाभणे हे होणे नाही .मध्यातून परतीचा मार्ग केव्हाच बंद झालेला आहे हे निमूटपणे व मनापासून मान्य करणे हेच केवळ हातात उरलेले आहे.त्यामुळे मरणाची भीती न बाळगता त्याला सामोरे जाणे, त्याला भेटणे, त्याच्यात सामावून जाणे हे गरजेचे आहे. त्याला पर्याय नाही.येथे क्षणभंगुर देह नष्ट होऊन अविनाशी आत्म्याचा उदय परत होणार असा अर्थही अभिप्रेत असावा असे वाटते.पुनरपि जननम् पुनरपि मरणम् मधील आशावाद मनात रुंजी घालत आहे.भारतीय परंपरेत पुनर्जन्म मानला जातो.नष्ट वा अंत झालेल्या देहातील आत्मा अमर आहे व तो पुन्हा जन्म घेतो या कडे कवीने लक्ष वेधले आहे.या दृष्टीने या कवितेचे भावनिक मोल अमूल्य आहे.

निसर्गातील रूपकांचा दाखला देत संपूर्ण मानवी जीवनाचा चलपट शब्दांकित केलेला आहे. सहज सोपे सुलभ शब्द वापरून अत्यंत मोठा जीवनविषयक अर्थ या कवितेतून मांडलेला आहे.

पुन्हा प्राचीवर यायला

मावळतीच्या क्षितिजा पलीकडे

बुडी मारायलाच हवी

पश्चिमेला मावळायालाच हवे

अस्त करून घ्यायलाच हवा.

मावळतीवर पोचल्यावर दृष्टिकोन कसा असावा, कसा ठेवावा याचे विवेचन करून झाल्यानंतर त्याचे सार या शेवटच्या कडव्यात सांगितले आहे. संपूर्ण कवितेचा कळसाध्याय म्हणता येईल असे हे कडवे आहे. पुन्हा प्राची (पूर्वेला) उगवण्याकरता सूर्याला जसे मावळतीला (पश्चिमेला) क्षितिजा पलीकडे बुडी मारणे गरजेचे आहे तद्वतच अगदी तसाच दृष्टिकोन माणसाने जीवनाप्रती ठेवला पाहिजे ही जाणीव सुस्पष्टपणे करून दिलेली आहे .व ती करून देताना अत्यंत सकारात्मक भावना ठेवलेली आहे .दुःखाचा लवलेशही त्यात नाही. “बुडी मारणे” या शब्दातून पूर्णतः ,संपूर्णतः हा भाव स्पष्टपणे सांगितला आहे. ही जाणीव हृदयातून पूर्णपणे स्वीकारायला हवी ,अंशतः नाही हे लक्षात आणून दिले आहे. पुन्हा उदयाची आस मनात ठेवल्याने वा असल्याने मावळतीच्या मार्गे अस्ताला पोहोचणे हे क्रमप्राप्त आहे. त्यामुळे अज्ञात , अथांग ,असीम क्षितिजाच्या पलीकडे बुडी मारल्या विना ,पश्चिमेला मावळल्याविना पूर्वेला उदय होणार नाही हे लक्षात घेणे किती गरजेचे आहे हे ध्यानात येते. सूर्य व माणसाचे जीवन यांचा आयुष्यपट समांतर तऱ्हेने मांडून जीवनाची उकल सोपी ,सहज करून सांगितली आहे . प्रत्येकाला आपला जीवनक्रम डोळ्यासमोर येतो तेव्हा हीच गत होते. त्यामुळे या भावनेशी संबंध जोडला जातो ,ती भावना अंतःकरणापासून उमगते.

संपूर्ण कवितेत जगण्याचे भान दिले आहे. आयुष्याकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन वर्णिला आहे .कर्म करता करता फळाची अपेक्षा न धरता निसर्ग नियमाने चालावे ,वागावे व अटळ सत्याकडे डोळसपणे पाहण्याचे ध्येय बाळगणे श्रेयस्कर आहे हे स्पष्ट केले आहे. आयुष्यामध्ये रुसवा ,राग , कुठल्याही प्रकारचा सवाल उपस्थित करणे योग्य नाही. पूर्णपणे आशावाद आणि सकारात्मकता जागवणारी ही कविता आहे. जीवनाचा दर्जा ,जीवनमान ,जीवनस्तर चांगल्या प्रतीचा होण्याकरिता जो मार्ग अनुसरायला हवा तो सोदाहरणातून कवीने दाखवला आहे. म्हातारपणाकडे नेणारा अटळ प्रवास दुःखदायी होणार नाही याकरता विचारांची व आचारांची सहेतुक सांगड घालणे हा महत्त्वाचा संदेश यात दिलेला आहे. कवितेतील यथार्थ शब्दयोजना अत्यंत महत्त्वाची आहे. कवितेत योजलेला शब्द न शब्द त्याचा स्वतःचा विशिष्ट अर्थ घेऊन काव्यवाचकांच्या समोर प्रकट झाला आहे .अर्थातच त्यामुळे कवितेत मांडलेल्या भावनेला कमालस्तर प्राप्त झाला आहे. व कवितेच्या अर्थाला उंची व खोली लाभलेली आहे. कवितेचा काव्यरसिकांच्या मनावर होणारा परिणाम परिणामकारकतेने साधला गेला आहे. मुक्तछंदातील या काव्यरचनेला लय ताल लाभलेला आहे .उगाचच साहित्यिक अलंकारांचे अवडंबर व अवास्तव आग्रह न धरता,सर्वांना सहजपणे सुलभतेने कळेल अशी ही रचना केलेली आहे. व असा दृष्टिकोन कवितेतील आशयाला व भावार्थाला अनुरूप आहे. या कवितेतील अर्थ सजगपणे ,सखोलपणे ,सूज्ञपणे व समंजसपणे समजून घेतला तर मावळतींचा उंबरठा उदासीन कुणाला ही बनवणार नाही. भूत व वर्तमान यांचे भान ठेवून भविष्यकाळाचा वेध घेणारी नजर कवीला लाभली आहे. आपल्यालाही अशी नजर लाभावी असा विचार नक्कीच मनात डोकावतो. ही कविता म्हणजे आयुष्याच्या प्रवासाचे सुंदर व लोभस प्रतिबिंब आहे. त्यात सरणारा काळ आणि माणसाच्या प्रतिभेचा व आवडीचा आविष्कार व त्याच्या शोधातला पाठपुरावा यामधला प्रवास स्पष्ट केला आहे. भाषा संपन्न, अलंकारिक व उद्बोधक आहे .जीवनचक्र त्यातील चढ-उतार यांना सूर्याच्या रूपकातून स्पर्श करण्याची कल्पना प्रेरणादायी व विचार करायला प्रवृत्त करणारी आहे. सूर्योदय ते सूर्यास्त हा सूर्याचा जीवनक्रम माणसाच्या जीवन चक्राशी साधर्म्य दर्शवतो. सांजवेळ ही संध्या प्रकाश दाखवते तर क्षितिज हे आयुष्याची सीमा दर्शवते. ही कविता प्रत्येकाला विचार करायला प्रवृत्त करते. मातृभाषेतून व्यक्त केलेली भावना संस्कृतीला व परंपरेला धरण्याचे महत्त्वाचे कार्य करते .कवितेचा आकृतीबंध व रचना कवितेचा सर्वांगीण व सर्वंकष प्रभाव वाढवते.

© नीलिमा खरे

२५-८-२०२४

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /मंजुषा मुळे/गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ “तुझा तूच त्याचा..” – कवी : दिवाकर बुरसे – रसग्रहण : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? काव्यानंद ?

☆ “तुझा तूच त्याचा..” – कवी : दिवाकर बुरसे – रसग्रहण : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

राष्ट्रीय सुरक्षितता सप्ताह

प्रतिवर्षी ४ ते १० मार्च या काळात ‘राष्ट्रीय सुरक्षितता सप्ताह’ देशभर साजरा केला जातो. औद्योगिक क्षेत्रात याचे विशेष महत्व आहे. या वर्षीच्या- आजच्या ४मार्चला सुरू होत असलेल्या – सुरक्षितता सप्ताहानिमित्त वाचकांना एका कवितेची अल्पशी भेट आणि सर्वांना सुरक्षित जीवन लाभावे ही ईश्वरचरणी ‘यंत्रदासा’ची मनोमन प्रार्थना.

श्री दिवाकर बुरसे

☆ तुझा तूच त्राता ☆

पहा मानवा, यंत्रक्रांतीमुळे आज

मानेवरी बैसली जोखडे

सुरक्षीतता पाहणे काम तूझे

जरी ध्यान कोणी न दे त्याकडे।।धृ।।

 *

जसा लागला शोध चक्रा-गतीचा

जगाने गती घेतली केवढी

कुणाला नसे थांबण्या वेळ आता

मढ्यांना इथे स्वस्थता तेवढी!

अशा जीवघेण्या प्रवाहातुनीही

तुला जायचे पैलतीराकडे

सुरक्षीतता पाहणे काम तूझे

जरी ध्यान कोणी न दे त्याकडे।।१।।

 *

किती वादळी वेग हे वाहनांचे

तयातून जाणेच आहे सुखे

वितीचे तुझे पोट! जे जाळण्याला

पडे खेळणे अग्निसंगे इथे

तरी पाळ सारे इशारे दिलेले

जराही नको वागणे वाकडे

सुरक्षीतता पाहणे काम तूझे

जरी ध्यान कोणी न दे त्याकडे।।२।।

 *

पहा, वाहते गोगलीशंख पाठी

ढके वादळी उंटनाका सुखे

अती दक्षतेने चले सूरवंट

मधूमक्षिकांची पहा कौतुके

वनी अस्वलेभाकऱ्या साठवीती

मनू का असे हीन त्यांच्या पुढे?

सुरक्षीतता पाहणे काम तूझे

जरी ध्यान कोणी न दे त्याकडे।।३।।

 *

तुझा तूच त्राता, नसे अन्य कोणी

मनी जाण हे सत्य जे सांगतो

अती दक्षतेने सदा वागतो जो

तयाचीच चिंता हरी वाहतो!

न घे काळजी देह, यंत्रा-धनाची

असा जीव देवा कदा नावडे

सुरक्षीतता पाहणे काम तूझे

जरी ध्यान कोणी न दे त्याकडे।।४।।

🙏🏽

©️ यंत्रदास

दिवाकर बुरसे, पुणे

संपर्कः ९५५२ ६ २ ९२ ४ ५

वरील कवितेचे कौतुक करणाऱ्या अनेक प्रतिक्रिया आजवर प्राप्त झाल्या आहेत. त्यातली वानगी म्हणून पुढील रसग्रहणात्मक प्रदीर्घ प्रतिक्रिया वचकांनाही आवडावी. दुर्दैवाने प्रतिक्रिया देणाऱ्या रसिकाचे नाव मात्र ठाऊक नाही. त्या अज्ञात रसिक वाचकाचे मनःपूर्वक आभार!

🪷

तुझा तूच त्राता — सजगतेचा जागर

रसास्वाद : अज्ञात

१९९२ साली लिहिलेल्या या कवितेतील विचार आणि संदेश आजच्या काळाशीही सुसंगत आहेत.

ही कविता म्हणजे केवळ शब्दरचना नाही;

ती कारखान्याच्या सायरनसारखी कर्णकर्कश नाही,

तर अंतर्मनात घुमणारी सावधानतेची घंटा आहे.

४ ते १० मार्च या कालावधीत देशभर साजरा होणाऱ्या राष्ट्रीय सुरक्षितता सप्ताहाच्या भावनेला साजेशी ही रचना, National Safety Council यांच्या ध्येयवाक्याला काव्यरूप देते—

“Safety First” हे केवळ फलकावरचे वाक्य नाही;

ते जगण्याची पद्धत असायला हवी.

यंत्रयुगातील मानवा, थांब क्षणभर!

मानेवरी बैसली जोखडे

ही ओळ वाचताक्षणी आपण स्वतःला एखाद्या वेगवान कन्वेयर बेल्टवर उभे असल्याचे पाहतो.

यंत्रांनी आपले आयुष्य सुलभ केले,

पण वेगाच्या मोहाने आपणच स्वतःला जोखडात अडकवून घेतले नाही ना?

कवी येथे उपदेश देत नाही—

तो आरसा दाखवतो.

वेग, प्रवाह आणि पैलतीर

मढ्यांना इथे स्वस्थता तेवढी!

ही ओळ चटका लावते.

जीवंत राहायचे असेल, तर सदैव जागृत राहावे लागेल.

जीवन हा प्रवाह आहे;

परंतु पैलतीर गाठायचे असेल, तर पोहता आले पाहिजे—

आणि पोहताना नियम पाळले पाहिजेत.

सुरक्षितता म्हणजे भीती नव्हे;

तीच खरी शौर्याची जननी आहे.

 

अग्नीशी खेळणाऱ्यांची प्रार्थना

वितीचे तुझे पोट! जे जाळण्याला

पडे खेळणे अग्निसंगे इथे

उद्योगक्षेत्रातील कामगारांचे हे जिवंत चित्र आहे.

उपजीविकेसाठी जोखीम स्वीकारावी लागते;

पण जोखीम आणि निष्काळजीपणा यात फरक आहे.

हेल्मेट, हातमोजे, इशारे, नियम—

हे केवळ औपचारिकतेचे भाग नाहीत;

ते जीवाचे कवच आहे.

Safety First म्हणजे

काम थांबवणे नव्हे,

तर काम जिवंत राहून पूर्ण करणे!

 

जीवसृष्टी विवेके चाले

गोगलगाय कवच घेऊन फिरते.

मधमाशी शिस्तीत उडते,

भविष्यासाठी अन्नसंग्रह करून ठेवते.

अस्वल साठवण करते.

निसर्गातील प्रत्येक जीव सावध आहे.

मग बुद्धिमान मानवच निष्काळजी का?

प्रश्न टोकदार आहे;

पण तो टोचण्यासाठी नाही—

जागवण्यासाठी आहे.

 

तुझा तूच त्राताघोष नव्हे, मंत्र

ही कविता शेवटी घोषणेत परिवर्तित होते.

धृपदाची पुनरावृत्ती म्हणजे जणू प्रत्येक शिफ्टच्या सुरुवातीला घेतलेली सुरक्षिततेची प्रतिज्ञा—

सुरक्षीतता पाहणे काम तुझे

जरी ध्यान कोणी न दे त्याकडे.

कोणी पाहो वा न पाहो,

सीसीटीव्ही असो वा नसो,

देवावर श्रद्धा असो वा नसो—

सजगतेची जबाबदारी स्वतःचीच आहे.

अती दक्षतेने सदा वागतो जो

तयाचीच चिंता हरी वाहतो

हे वाक्य म्हणजे तर एक सुभाषितच आहे

येथे श्रद्धा आणि शिस्त यांचा सुंदर संगम आहे.

देव सहाय्य करतो—

पण आधी आपण स्वतःच स्वतःला सहाय्य केले पाहिजे.

 

काव्यवैशिष्ट्यांचा तेजोमय आविष्कार

घोषवाक्यात्मक क्षमता – प्रत्येक कडवे जणू पोस्टरवर उमटावे असे!

प्रातिनिधिक प्रतिमा – यंत्र, वाहन, अग्नी, प्राणी—जीवनाच्या सर्व क्षेत्रांना स्पर्श.

सरळ पण परिणामकारक भाषा – वाचक थेट संवादात ओढला जातो.

प्रेरणादायी स्वर – भीती नव्हे, आत्मविश्वास जागवणारा.

हो, काही ठिकाणी कविता प्रचारात्मक भासते;

पण सुरक्षिततेसारख्या विषयात तोच तिचा अलंकार ठरतो.

कारण येथे सौंदर्यापेक्षा प्राण महत्त्वाचा आहे.

 

अंतिम संदेश

ही कविता वाचून मनात एकच ओळ घुमत राहते—

Safety First म्हणजे Life Always.

तुझा तूच त्राता

हे केवळ एक शीर्षक नाही,

तो जीवनरक्षणाचा मंत्र आहे.

कारखान्यात, रस्त्यावर, प्रयोगशाळेत, घरात—

जिथे जिथे जोखीम आहे,

तिथे तिथे ही कविता जपमाळेसारखी अंतरात असावी.

🪷

सजग राहूया.

सुरक्षित राहूया.

प्रत्येक दिवसाच्या सुरुवातीला स्वतःलाच सांगूया—

सुरक्षीतता पाहणे काम माझे!

🙏🏽🙏🏽🙏🏽

दिवाकर बुरसे, पुणे

संपर्कः ९५५२ ६ २ ९२ ४ ५

प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित

सांगली 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ श्रीपाद वल्लभ दिगंबरा… कवी : डॉ. निशिकांत श्रोत्री ☆ रसग्रहण – नीलिमा खरे ☆

नीलिमा खरे

? काव्यानंद ?

☆ श्रीपाद वल्लभ दिगंबरा… कवी : डॉ. निशिकांत श्रोत्री ☆ रसग्रहण – नीलिमा खरे ☆

भावना प्रधान, भावुक मन आजूबाजूला व समाजात घडणाऱ्या घटनांकडे सजगतेने आणि सहृदयतेने पाहत असते. जागृत झालेल्या जाणिवा आणि आलेल्या अनुभूती यांच्याशी भावनांचा संबंध जोडू पाहते. त्यात आपल्या जगण्याच्या आचार- विचारांचे प्रतिबिंब शोधू लागते. प्रत्येक वेळी/ दरवेळी ते मनाला आवडेल, रुचेल असे असेलच असेही नाही. अशावेळी मनातल्या विचारांना केवळ स्वतःच्या आचरणाची जोड देऊन भागणार नाही हे लक्षात येते. समाजातल्या लोकांच्या मनाचे परिवर्तन घडावे, त्यात चांगले हितकारक बदल व्हावेत असे मनोमन वाटू लागते. परंतु हे विचार प्रत्यक्षात उतरणे आणि उतरवणे खूप अवघड असते. काही वेळा प्रत्यक्ष कृती करूनही ध्येय साध्य होईलच असेही नाही. साहजिकच हतबल, व्याकुळ झालेले मन नेहमीप्रमाणेच सर्व विश्वाचा स्वामी, निर्माता, कर्ता करविता जो ईश्वर त्याच्याकडे धाव घेते. त्याला भक्तिभावाने साद घालते. अशा आर्त भक्ती भावनेचा प्रत्यय देणारी डॉक्टर निशिकांत श्रोत्री यांची “श्रीपाद वल्लभ दिगंबरा “ही कविता आज आपण वाचणार आहोत. त्यातील विचार, त्यातला भक्तिभाव जाणून घेणार आहोत. ही नुसती कविता नाही तर भक्ती भावनांनी ओथंबलेले कवन आहे..

☆ श्रीपाद वल्लभ दिगंबरा – डाॅ. निशिकान्त श्रोत्री ☆

कलियुग जगती जगदोद्धारा घेउनि या अवतारा

दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ||ध्रु||

*

परधर्माचा नाही आदर स्वधर्माची ना जाण

मी अन् माझे यातच गेले गुरफटुनी जीवन

पीडितास पाहुनी मनी ना आपुलकीचा झरा

माणुसकीचा खेळ मांडुनी मानवास उद्धरा ||१||

*

मानवतेची ओळख नाही स्वार्था जोपासले

चैन दाम अन् ऐशोरामी देवाला पाहिले

मोहाच्या जाळ्यात गुंतला वैभवाचा तोरा

भवसागरी नर बुडून गेला हात देऊनी तारा ||२||

*

बुद्धीचा त्या माज चढला ज्ञानयोग विसरला

कर्मयोगाची नाही जाण कर्मकांडी रमला

भक्तीचा बाजार मांडिला धनवैपुल्य गुबारा

द्युलोका सोडूनी येउनी मानवास आवरा ||३||

*

चराचरांचा स्वामी म्हणवित मानव हा मातला

दया कणव न याला ठावे क्रौर्याचा हा पुतळा

वृक्षवल्लींचा पशुपक्ष्यांचा निर्घृण हा हत्यारा

इह्लोकाव्र अवतारुनी या सृष्टीला सावरा ||४||

©️ डॉ. निशिकान्त श्रोत्री
एम. डी. , डी. जी. ओ
दत्तजयंती – २६ डिसेंबर २०२३

☆ रसग्रहण ☆

श्रीपाद वल्लभ दिगंबरा या शीर्षकातून ही कविता सदृश्य आरती श्री गुरुदेव दत्त यांच्या प्रती लिहिलेली आहे हे लक्षात येते. श्रीपाद वल्लभ दिगंबरा या त्रि अक्षरी नामाचा महिमा इतका जबरदस्त आहे की निव्वळ शीर्षक वाचल्यावर आपल्या मनातही भक्तीचे भावतरंग उमटू लागतात. आपल्या डोळ्यासमोर श्री दत्तगुरूंची सात्विक मूर्ती साकार होते. साहजिकच ही कविता वाचताना त्या भक्ती भावाने ती आतुरतेने वाचण्याची इच्छा होते.

*

कलियुग जगती जगदोद्धारा घेउनि या अवतारा

दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ||ध्रु||

*

कलियुगातील अस्थिर, अनैतिक, अनिर्बंध, अविचारी, अविवेकी आचार विचार सुज्ञ माणसाला रुचणे खरंच अवघड आहे. चुकीच्या मार्गाचा विचार करणारी व त्या नुसार जगणारी माणसे ही समाजाला लागलेली कीड आहे. त्यांचे अंतर्बाह्य परिवर्तन करणे /होणे अत्यंत जरुरी आहे. यासाठी केवळ मानवी प्रयत्न पूरे पडणारे नाहीत हे सत्य आहे. हा बदल घडवून आणणे केवळ ईश्वरालाच शक्य आहे. ब्रम्हा, विष्णू, महेश या अनुक्रमे सृष्टीचा निर्माता, पालक व विनाश या तिन्ही शक्तींचे प्रतीक असलेल्या श्री दत्तगुरूंना कवी आवाहन करतो आहे. या जगती कलियुगाच्या बजबजपुरीतला अंधःकार दूर करण्यासाठी, जगाच्या उद्धारासाठी तुम्ही अवतार घ्या असे कवी विनवतो आहे. “अवतार घेऊन या “यातील श्लेष महत्त्वाचा. स्वतः श्री दत्तगुरूंनी अवतरावे. किंवा निदान अशी शक्ती /विभूती बनून भूतलावर यावे जी दैवी अवतारा सम असेल. त्याला घेऊन/ तसे बनून तुम्ही पृथ्वीवर या अशी याचना/आंतरिक प्रार्थना कवी करत आहे. “दिगंबरा दिगंबरा “या सुप्रसिद्ध जपातून कवी श्री दत्तगुरूंना आवाहन करतो आहे. श्रीपाद वल्लभ दिगंबरा हे सारे शब्द मूळ संस्कृत भाषेतील आहेत. संस्कृत ही देववाणी असल्याने या शब्दांना मंत्र रूप लागले आहे, मंत्र सामर्थ्य लाभलेले आहे. या मंत्ररुपाने कवी श्री दत्तगुरूंची आराधना करून त्यांना साद घालतो आहे. हा मंत्र सत्व, रज, तम या त्रिगुणांच्या परे आहे. अशा या परमात्म्याचे अनुसंधान करून त्याला जगताच्या उद्धारासाठी कवी मनापासून आवाहन करतो आहे. जगती जगदोद्वारा हा अनुप्रास व अवतारा- दिगंबरा हे यमक अतिशय सहजतेने या कवितेच्या ध्रुवपदात आले आहे. त्यामुळे ध्रुव पदाला एक उत्तम लय लाभलेली आहे. साहजिकच ध्रुवपदापासूनच या कवितेची गेयता लक्षात येते जी या आरती स्वरुप कवितेच्या रचनेसाठी अत्यंत जरुरी आहे.. यामुळे कवीच्या साहित्यिक जाणीवांची जाण वाचकांना होते.
*

परधर्माचा नाही आदर स्वधर्माची ना जाण

मी अन् माझे यातच गेले गुरफटुनी जीवन

पीडितास पाहुनी मनी ना आपुलकीचा झरा

माणुसकीचा खेळ मांडुनी मानवास उद्धरा ||१||

*

समाजातील परिस्थितीचे /वातावरणाचे अतिशय मोजक्या व प्रांजल शब्दांत वर्णन केले आहे. ही परिस्थिती पूर्णपणे वास्तविक, सत्यदर्शी आहे. यात कुठेही कवी कल्पना नाही. धर्माच्या आधारावर विशिष्ट गट निहाय संस्कृती /धर्म जाणून-बुजून निर्माण केले जात आहेत. सर्वधर्मसमभाव ही संकल्पना कोणीही मानत नाही/ जाणत नाही. परधर्माविषयीचा आदर, त्यासंबंधी जाणीव, त्यातील जीवनमूल्ये, धर्मविषयक विचार कुणालाही जाणून घेण्याची इच्छा नाही. परधर्माला नावे ठेवणे एवढा एकच क्षुल्लक आणि निकृष्ट विचार सर्वांच्या मनावर राज्य करतो आहे. साहजिकच परधर्माविषयी आदरभाव मनात नाही आणि त्याचवेळी स्वधर्माची ही पुरेशी किंबहुना किंचितही जाणीव नाही असे आढळून येते. स्वधर्म आणि परधर्म या शब्दांवरील श्लेष अतिशय उत्तम. येथे केवळ धार्मिक, अध्यात्मिक ग्रंथ, वेद पुराणे यांचा संदर्भ नक्कीच अपेक्षित नाही. स्वतः सोडून जो दुसरा तो परका असे मानले जाते. अशा व्यक्तीविषयी माणूस म्हणून काही धर्म, काही कर्तव्ये आहेत असा विचार किंवा असे आचरण बिलकुल ही नाही. अशा दृष्टीने परधर्माविषयी आदरभाव/जाण नाही. एवढेच काय स्वधर्म म्हणजे स्वतःची स्वतःबद्दलची व इतरांना अपेक्षित असलेली कर्तव्ये यांचीही पुरेशी जाणीव नाही. थोडक्यात परधर्म आणि स्वधर्म या दोन्ही विषयी समाजात घोर अज्ञान आहे किंवा ज्ञान असूनही त्याप्रमाणे वागण्याचा सूज्ञपणा व विवेक बुद्धी नाही. मी, माझा स्वार्थ, माझे हित इतक्या संकुचित वृत्तीत जनसामान्यांचे मन गुरफटून गेले आहे. त्या व्यतिरिक्त कुठलीही भावना, वेदना, संवेदना कुणाच्याही मनात जागी होत नाही. एखाद्या दु:खी, खिन्न, गरजू व्यक्तीला पाहून मनात आपुलकीचा झरा वाहत नाही. ही खरंतर सहज सोपी गोष्ट ती ही अतिशय दुर्मिळ झाली आहे. कुणाच्याही मनाला पाझर फुटत नाही. सर्वांची मने पाषाण हृदय झालेली आहेत. येथे “मन गुरफटून गेले आहे” हा जो शब्द प्रयोग केला आहे तो अतिशय समर्पक. या शब्दातून एखाद्या गोष्टींमध्ये अडकणे, गुंतणे, गुंतागुंतीच्या जाळ्यात सापडणे ही अपेक्षित भावना सुस्पष्टपणे व्यक्त होते. ती या कवितेतील आशयाला पूरक आहे.

कुणाला वेदना /पीडा असतील तर त्यांना मदत करून त्या दूर करणे हा साधा विचारही हल्ली पटकन कोणाच्या मनात येत नाही. त्याप्रमाणे आचरण करणे तर दूरच!! सर्वज्ञानी परमेशाने जगाची निर्मिती करून संसाराचा/ भवसागराचा हा खेळ मांडला आहे असे पण मानतो. आता कवी त्याला विनवितो आहे की हे ईश्वरा! तू आता माणुसकीचा खेळ मांड. कुठल्याही खेळात माणूस जसा रमून जातो तसा माणुसकीच्या खेळात माणसाने रमावे अशी इच्छा कवी व्यक्त करत आहे. प्रत्येकाच्या मनात माणुसकी जागव, त्याचे महत्व त्यांना पटवून दे आणि असे करून मानवाचा उद्धार कर असे प्रतिपादन कवीने केले आहे. येथे संपूर्ण मानवजातीचा उद्धार अपेक्षित आहे.
परधर्म व स्वधर्म यातील श्लेष, पीडितास -पाहुनी मधील अनुप्रास, झरा -उद्धरा हे यमक हे अतिशय सुलभतेने साधले आहे. त्यामुळे ध्रुवपदापासून कवितेला लाभलेली गेयता जपली गेली आहे..

*

मानवतेची ओळख नाही स्वार्था जोपासले

चैन दाम अन् ऐशोरामी देवाला पाहिले

मोहाच्या जाळ्यात गुंतला वैभवाचा तोरा

भवसागरी नर बुडून गेला हात देऊनी तारा ||२||

*

मानवतेची ओळख मानवालाच राहिली नाही हे सखेदपूर्वक मांडून कवी म्हणतो की माणसाने स्वार्थ फक्त जाणले नाही तर ते जोपासले. स्वार्थाच्या पलीकडे जाऊन मानवतेची माणसाचीच ओळख उरलेली नाही. संबंध उरला नाही. किंवा त्याला त्याची जाण नाही, जाणीव नाही या अर्थानेही ओळख हा शब्द वापरलेला आहे. ओळख या शब्दावरील हा श्लेष अतिशय समर्पक आहे. येथे जाणीवपूर्वक स्वार्थाने वागणे या सत्याकडे निर्देश केला आहे. चैन, दाम म्हणजे पैसा व ऐशोराम यालाच आणि याच्यातच देव पाहिला. स्वार्थ लोलुप, स्वार्थाने अंध झालेला हा समाज आहे. कितीही लाभले तरी अजून हवेच हा माणसाच्या मनाचा व मनातला जप काही संपत नाही. त्याला सतत” अजून काहीतरी हवे “याची आसक्ती आहे, त्याचा मोह आहे. या मोहाच्या जाळ्यात मानव गुंतला. मोहाचे जाळे मधील श्लेष अतिशय समर्पक.. अजून हवे हा मोह व ते मिळवण्यासाठी वापरले जाणारे चुकीचे मार्ग यांचा मोह..

येथे अजून एक अर्थ आपल्याला लक्षात येऊ शकतो. सध्याच्या युगात देवाची मंदिरे ही पूजा, अर्चना, साधना, आराधना यासाठीची ठिकाणे राहिली नसून तेथेही देवाला अद्ययावत सुख सोयी देऊन त्याला करोडोंचे अलंकार घालण्याची प्रथा रुजली आहे. देवाला दागिन्यांनी मढवून स्वतःच्या वैभवाचा तोरा मिळवणे म्हणजेच भक्ती असा चुकीचा अर्थ लोकांच्या मनात रुजू पाहत आहे. वैभवाचा तोरा मिरवणे यातच प्रत्येकाला आपल्या आयुष्याची इति कर्तव्यता वाटते. वैभव मिळवणे त्यासाठी प्रयत्न करणे हे पाप नाही, गुन्हा नाही. पण त्यासाठी/ त्याच्या प्राप्तीसाठी माणूस मोहाच्या जाळ्यात गुंतला. या वास्तवाकडे सुस्पष्टपणे निर्देश केला आहे अतिशय सहजतेने आणि प्रभावीपणाने. वैभवाचा तोरा मिरवणे यामध्ये बडे जाव दाखवण्याची आसक्ती दिसून येते. हा शब्दप्रयोग एकदम यथार्थ आहे. कवितेतील आशयाला ठोसपणे मांडणारा व पुष्टी देणारा. वैभवाचा तोरा मोहाच्या जाळ्यात गुंतला.. येथे योजलेल्या रुपक व चेतना गुणोत्ति अलंकारांनी कवितेतील भावना प्रकर्षाने मांडली आहे. भव सागरात नर म्हणजे मानव जात बुडून गेली आहे असे म्हणून कवी मानवाला तारा, त्याला सांभाळा असे विनवतो आहे. “बुडून” या शब्दावरील श्लेष अतिशय उत्तम. एक अर्थ त्यात गुरफटला, गुंतला व दुसरा अर्थ म्हणजे लोप पावला, हरवला, त्याचे अस्तित्व संपले. अशा या बुडणाऱ्या नराला आधाराचा हात देऊन, त्याला योग्य ज्ञान देऊन, मार्गदर्शन करून त्याचा तारणहार बना असे कवी श्री गुरुदेव दत्तांना विनवितो आहे. नराचा नारायण करायचा असेल तर खुद्द नारायणाने, ईश्वरानेच त्याला मदत करणे आता आवश्यक आहे व ते केवळ त्याला शक्य आहे. वैभवाने आणि दिखाऊ पणाने देव मूर्तीला सजवून आपल्या भक्तीचे प्रदर्शन करणे ही चुकीची प्रथा सध्या रुजलेली दिसते. देव मूर्तीत नाही, त्याच्या सजावटीत नाही तर मानवतेच्या/ माणुसकीच्या आचरणात देव असतो. माणसाने माणसाशी चांगले वागणे हाच खरा धर्म आणि हीच खरी देवपूजा. आता नारायणाने स्वतः अवतार घेऊन नराला या सर्व परिस्थितीत तारावे अशी कामना कवी व्यक्त करतो आहे.

जोपासले -पाहिले, तोरा -तारा अशी शब्द योजना करून सहजपणे यमक अलंकार साधला आहे. तसेच ओळख व बुडून या शब्दावरील श्लेषही अतिशय सुंदर..

*

बुद्धीचा त्या माज चढला ज्ञानयोग विसरला

कर्मयोगाची नाही जाण कर्मकांडी रमला

भक्तीचा बाजार मांडिला धनवैपुल्य गुबारा

द्युलोका सोडूनी येउनी मानवास आवरा ||३||

*

माणसाला स्वतःच्या बुद्धीचा सार्थ अभिमान न उरता तो माजला आहे. तसे पाहिले तर बुद्धीचे दान हे ही ईश्वर मर्जीनेच /ईश्वर कृपेनेच लाभलेले आहे. तरीही त्या बुद्धीच्या जोरावर वाटेल ते करता येते आणि तसे केले तरी अडवणार कोण असा मस्तीचा /मिजाशीचा भाव मानवाच्या मनात राज्य करतो आहे. मला हवे तसे, हवे तेव्हा, हवे तेवढे मिळवण्यासाठी बुध्दीचा वापर करणे यात त्याला काही ही गैर वाटत नाही. असे करताना इतरांना त्रास झाला, काही गोष्टींचा ऱ्हास झाला तरी तो बेफिकीर असतो. ज्ञानाने सर्वांचे हित साधावे कुणाला त्रास देऊ नये हा अर्थ तो सोईस्करपणे विसरला आहे येथील ज्ञानयोग या शब्दावरील श्लेषही अतिशय सुंदर आणि समर्पक. जीव, जगत व परब्रम्ह यांचे यथार्थ ज्ञान शास्त्रांच्या, वेदांच्या अभ्यासाने व गुरुच्या साह्याने करून घेणे आणि त्यातून ब्रह्म ऐक्य जपणे/ अनुभवणे याला ज्ञानयोग म्हणतात. पण दुर्दैवाने माणूस हेही विसरला आहे. त्या प्रती त्याच्या मनात आस्था उरलेली नाही. या प्रमाणे अध्यात्मिक ज्ञान व विविध विषयांबाबतचे ज्ञान असे दोन्ही अर्थ इथे अभिप्रेत आहेत. माणूस ज्ञानयोग तर विसरलाच पण कर्मयोगाची ही जाणीव तो बाळगत नाही. आपल्या वाट्याला आलेले कर्म फळाची अपेक्षा न करता करावे हा खरंतर कर्मयोग! कर्मयोग साधता साधता मोक्षाची अपेक्षा करणे, त्या दिशेने प्रवास करणे हा भावही मनात उरलेला नाही. केवळ कर्मकांडात म्हणजे मूर्ती पूजा, जपतप, व्रत वैकल्ये यातच तो रमला. त्याचा खरा अर्थ जाणून न घेता मंदिरात व घरीही विविध याग, होम अशा प्रकारे कर्मकांड करण्यात तो धन्यता मानत आहे. देवा संबंधी विविध कर्मे करणे चूक नाही. किंवा वाईट तर मुळीच नाही. पण त्यामागचा खरा अर्थ जाणण्याची इच्छाशक्ती किंवा प्रयत्न माणूस करत नाही. हे सर्व केले म्हणजे आपण देवधर्म केला असा खोटा अहंकार आणि खोटा आनंद माणूस मिळवतो आहे. हा समज नक्कीच चुकीचा आहे. खरा भक्ती भाव, समर्पण भाव दूरच राहिला एवढेच नव्हे तर त्याचा केवळ बाजार मांडला आहे. बाजार शब्द योजिताना त्याचे केलेले प्रदर्शन हा भाव अभिप्रेत आहे. तसेच येथे बुवाबाजीकडे अंगुली निर्देश असावा असे वाटते. हे लोक देव असल्याचा आविर्भाव आणतात, त्यातून स्वतःचे हित साधतात. या भक्तीतून समाजाचे प्रबोधन किंवा हित करणे हा हेतू बरेचदा मनात नसतो ही. भक्तीचा बाजार मांडून त्यात विपुल धनाचा /संपत्तीचा देखावा मांडतात. त्याचा गुबारा म्हणजे फुगा होतो ही शब्दयोजना अप्रतिम. केवळ टाचणीने फुटणारा हा गुबारा किंवा फुगा अर्थात त्याला तेवढे मोल नाही, महत्त्व नाही तो खोटा पोकळ अभिमान आहे हे लक्षात आणून दिले आहे. अशा बेभान बेफाम, बेलगाम वर्तनापासून /वागण्यापासून मानवाला आवरण्यासाठी, त्याला थांबवण्यासाठी, परावृत्त करण्यासाठी, योग्य मार्गदर्शन करण्यासाठी हे ईश्वरा! द्यू लोक म्हणजे स्वर्गलोक जेथे देवांचा वास आहे(जिथे देव राहतात अशी कल्पना /धारणा आहे) सोडून पृथ्वीवर सत्वर या असे आवाहन कवीने केले आहे. विसरला -रमला, गुबारा -आवरा हे सहज सुंदर यमक कवितेला नादमयता प्राप्त करून देते. तसेच ज्ञानयोग आणि कर्मकांड या दोन शब्दांवरील श्लेष खरोखर अप्रतिम आहेत. कांड करणे म्हणजे चांगला मार्ग सोडून त्याचा त्याग करून चुकीचा मार्ग अनुसरणे, वाईट वागणे जसे द्वेष, वैषयिक वासना इत्यादी.. तसेच दुसरा अर्थ आपल्या वाट्याला आलेले कार्य किंवा कर्म करताना त्याविषयी प्रामाणिक नसणे.

*

चराचरांचा स्वामी म्हणवित मानव हा मातला

दया कणव न याला ठावे क्रौर्याचा हा पुतळा

वृक्षवल्लींचा पशुपक्ष्यांचा निर्घृण हा हत्यारा

इह्लोकाव्र अवतारुनी या सृष्टीला सावरा ||४||

*

स्वतःला चराचराचा, सृष्टीचा, तिच्या वैभवाचा, सौंदर्याचा, संपत्तीचा स्वामी समजून मानव हा माजला आहे. ज्या गोष्टींची निर्मिती करता येत नाही त्या निसर्गाकडून लुटणे, लुबाडणे हेच मानवाचे ध्येय बनले आहे. स्वतःच्या सुखा पलीकडे त्याला दुसरे काहीही लक्षात येत नाही. सृष्टीचे जतन, संवर्धन याविषयी जराही जाण तो मनात बाळगत नाही. स्वामी जसा उपलब्ध साधन सामग्रीचा/ संपत्तीचा उपभोग घेण्यात धन्यता मानतो, त्यावर स्वतःचा हक्क प्रस्थापित करतो तद्वतच मानवाची मनोधारणा झाली आहे. कुठल्याही व्यक्तीबद्दल, प्राणी पक्षी यां बद्दल, झाडांबद्दल कसलीही दया, कणव या भावना मनात उरलेल्या नाहीत. क्रौर्याचा स्वार्थांध पुतळा म्हणावा असे रूप त्याने धारण केले आहे. क्रोध, राग, संताप, वध/ हत्या, असूया, इर्षा, सुखलोलुपता, वासनांधता अशा काम क्रोधादी विकारांनी त्याला पछाडले आहे, तो त्यांच्या अधीन झाला आहे. लता- वेली, झाडे झुडपे, पशुपक्षी यांच्या विषयी कसलाही ममत्त्वाचा, कृतज्ञपणाचा भाव त्याच्या मनात शिल्लक नाही. त्यांची निर्घृण हत्या करताना तो मागे पुढे पाहत नाही. जी झाडे त्याला सावली देतात, फळे -फुले देतात त्यांच्या जतनाबद्दल, त्यांच्या संवर्धनाबाबत अजिबात जागरुकता दिसून येत नाही. मन मानेल तसे झाडे, फुले, पाने तोडणे, झाडे मुळासकट नष्ट करणे, त्यांचे अस्तित्व नेस्तनाबूत करून त्या जमिनी बळकावणे असे कृतघ्न पणाचे कार्य मात्र अविरत चालू आहे. पक्षांची -प्राण्यांची शिकार करणे हेही तो साहसाचे/धाडसाचे लक्षण समजतो त्यामुळे त्यांचा जीव जातो त्याची थोडीही जाण तो ठेवत नाही. संपूर्ण सृष्टीच्या जीवन चक्राचा ऱ्हास होतोय हे लक्षात घेत नाही किंवा लक्षात आले तरी तसे आचरण करत नाही. साऱ्या चराचराचा स्वामी स्वतःला समजून, अप्पलपोटेपणा मनात बाळगून, स्वार्थ साधून स्वतःचा जास्तीत जास्त फायदा करून घेऊन, चराचराचा ऱ्हास मात्र तो करतो आहे. कवी श्री दत्तगुरुना विनंती करतो आहे की इहलोकी अवतार घेऊन या सृष्टीला सावरा, सांभाळा. अन्यथा तिला अपरिमित हानी पोहोचवण्याचे क्रूर काम मानव करतच राहील. म्हणून- मानव हा अनुप्रास, हत्यारा -सावरा हे यमक सहजपणे साधून कवितेतील लय आणि नादमयता जपली आहे.

अतिशय वास्तववादी कविता आहे ही. सांप्रत स्थितीचे विदारक शब्दचित्र रेखाटले आहे कवितेतून. साध्या सोप्या शब्दातून, बोजड शब्दांचा वा अतिरेकी अलंकारिक भाषेचा मोह अजिबात ठेवलेला नाही. साहजिकच सर्व स्तरातील लोकांना समजेल, कळेल अशी ही कविता. कवितेतील वास्तव/ सत्यता नाकारता न येण्यासारखी आहे. डोळ्यात अंजन घालणारी, माणसाला माणूसकीच्या भावनांची जाणीव करून देणारी कविता. सध्याची अवस्था इतकी बिकट झाली आहे, हाताबाहेर गेली आहे ही केवळ परमेश्वरच या परिस्थितीतून मानवाला आणि सृष्टीला तारून नेऊ शकतो. माणसाला लवकरात लवकर या साऱ्या परिस्थितीचे भान येवो, सद्बुद्धी लाभो अशी प्रार्थना ही आजच्या काळाची नितांत गरज आहे. उच्च शिक्षित, विद्याविभूषित डॉक्टर या नात्याने जगताना संवेदनशील जाणीव जपल्याने कवीला या भावना समजल्या आहेत. आणि त्यांनी त्या कवितेत शब्दबद्ध केल्या आहेत. ही कविता म्हणजे एक सामाजिक भक्ती काव्य आहे. मानवतावादी प्रार्थना आहे असे म्हणणे उचित ठरेल. मानवतेप्रती/समाजाप्रती अतिशय दुर्मिळ ठरेल अशा ध्येयवादी भक्ती भावनेने शब्दबद्ध केलेली प्रार्थना आहे. अशा प्रकारची प्रचारक, सुधारक भूमिका मांडण्याचे धैर्य आणि धाडस कवीने केले आहे. त्या साठी सादर प्रणाम!!!

© नीलिमा खरे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ प्रणयार्त… डॉ निशिकांत श्रोत्री ☆ रसग्रहण.. सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

? काव्यानंद ?

☆ प्रणयार्त… डॉ निशिकांत श्रोत्री ☆ रसग्रहण.. सौ राधिका भांडारकर ☆

काव्यानंद

अथर्ववेदात कामदेवाला सर्जनशील शक्तीचा संरक्षक मानले आहे. कामदेव म्हणजे तरुण स्त्री-पुरुषांच्या चित्तातील प्रेमाची अधिष्ठात्री देवता. ज्याचा जन्म ब्रम्हदेवाच्या हृदयापासून झाला.

मन्मथ, मदन, आनंद, कुशमेश्वर, प्रद्युम्न आणि कामदेवाची पत्नी रती म्हणून रतिकांत अशी कामदेवाची विविध नावे आहेत. कामदेव हे पुरुष प्रेमाचं प्रतीक आहे तर रती हे स्त्री प्रेमाचं प्रतीक आहे. कामदेव आणि रती दोन्ही प्रेम देवताच आहेत. आणि पर्यायाने सृजन अथवा उत्पत्ती देवता आहेत. विश्वाची निर्मिती तेव्हाच होईल जेव्हा स्त्री-पुरुषांमध्ये कामवासना प्रज्वलित होतील. या कामवासनेचा संभव रती आणि मदनदेवतेमुळे स्त्री-पुरुषांच्या शरीरात होतो जे अत्यंत नैसर्गिक आहे.

अशा प्रकारच्या कामभावनेने घायाळ झालेल्या एका तरुणीच्या प्रणयार्त मनस्थितीचे दर्शन देणाऱ्या अत्यंत संवेदनशील गीताचा आज आपण रसास्वाद घेऊया. गीतरचना अर्थातच डॉक्टर निशिकांत श्रोत्री यांची आहे आणि शीर्षक आहे प्रणयार्त.

☆ प्रणयार्त ☆

मयुरपिसांचा चंदनमंचक प्रणयातुर झाला

साद मन्मथा मदनशरांची येई शमवायला।।ध्रु।।

*

 धगधगत्या अंगा न साहवी तलम वस्त्र हलकी

 हिरमुसली होऊन बैसली फडताळी कंचुकी

 फुलती कलिका आर्त जाहली भृंगा भोगायला

 साद मन्मथा मदनशरांची येई शमवायला ।१।

*

ज्योत समयिची निरखुन बघते अनवरत्या देहा

 प्रणयदग्धता भाजुन काढी अवघ्या शयनगृहा

दवबिंदूंना आस लागली प्राशुनी घ्यायाला

साद मन्मथा मदनशरांची येई शमवायला ।।२।।

*

गवसणीस सोडून बैसला तानपुरा मोकळा

आहे केवळ ध्यास अंतरी स्पर्शसुखाचा मला

काळ तिष्ठला स्तब्ध होऊनी प्रणयाच्या साक्षिला

साद मन्मथा मदनशरांची येई शमवायला ।।३।।

*

डॉ. निशिकांत श्रोत्री.

 

या गीतातील धुंद, प्रणयोत्सुक, नशा चढलेली तरुणी जणू काही कामक्रीडेसाठी आवाहनच देत आहे. ती म्हणते,

 मयूर पिसांचा चंदन मंचक प्रणयातुर झाला

 साद मन्मथा मदनशरांची येई शमवायला ।ध्रु।

मोरपिसांचा मुलायम बिछाना असलेला हा चंदनाचा पलंगही माझ्या इतकाच कामक्रियेसाठी उत्सुक झालेला आहे. माझ्या अंगोपांगी संचारलेला हा कामाग्री शमवायला त्या सुगंधी मदनशरांचा वर्षावच व्हायला हवा.

पुढे ती म्हणते,

धगधगत्या अंगा न साहवी तलम वस्त्र हलकी

हिरामुसली होऊन बैसली फडताळी कंचुकी

 फुलती कलिका आर्त जाहली भृंगा भोगायला

साद मन्मथा मदनशरांची येई शमवायला

काम हा विकार असला तरी त्याची उत्पत्ती ही नैसर्गिक आहे. या गीतातील ही तरुणी या भावनावेगाने इतकी व्याकुळ झाली आहे की तिला अंगावरच्या तलम वस्त्रांचंही ओझं वाटतंय. अंगातली चोळी काढून टाकून तिला अनावृत स्थितीतच सौख्य वाटत आहे. उमलणाऱ्या फुलाला जशी गुणगुणणाऱ्या भ्रमराची ओढ असते तद्वत तिला प्रियकराच्या स्पर्शाची आर्त आस जाणवत आहे.

या चार पंक्तीत कवीची शब्दांवरची प्रभावी पकड जाणवते. किती काव्यमय पद्धतीने त्यांनी कामातुर तरुणीचे विवस्त्र पण चितारले आहे! कलिका आणि भुंगा या प्रतीकात्मक रूपकांविषयी आपण जरा नंतर विचार करूया.

ज्योत समयिची निरखुन बघते अनवरत्या देहा

प्रणय दग्धता भाजुन काढी अवघ्या शयनगृहा

दवबिंदूंना आस लागली प्राशुन घ्यायाला

 साद मन्मथा मदनशरांची येई शमवायाला

प्रियकराच्या स्पर्शासाठी आसुसलेली ही विरहिणीच आहे. या क्षणी तिच्यासोबत आहे ती समयिची प्रज्वलित ज्योत. जणू काही ती या प्रणयातुर नारीला निरखून पहात आहे. अवघ्या शयनगृहाला जणू काही पेटलेल्या या कामाग्नीची धग जाणवत आहे. तसेच अंतर्देहातून पाझरणार्‍या दवबिंदूनाही आता निराळ्या स्त्रोतात मिसळून जाण्याची घाई झाली आहे. नदीचं पाणी जसं सागराच्या प्रवाहात मिसळण्यासाठी उत्सुक असतं नेमकी हीच स्थिती इथे जाणवत आहे. आणि या विकारांची तृप्ती, शांती फक्त मदनशरांनीच होऊ शकणार आहे.

गवसणीचा सोडून बैसला तानपुरा मोकळा

आहे केवळ ध्यास अंतरी स्पर्श सुखाचा मला

काळ तिष्ठला स्तब्ध होऊनी प्रणयाच्या साक्षीला

 साद मन्मथा मदनशरांची येई शमवायला

प्रणयाच्या या धुंद, गंधित, निशेच्या परमोच्च बिंदूवर असताना देहावरच्या वस्त्रांचे तिला भान नाही. फक्त स्पर्श सुखासाठी तिचे अंतर्मन उत्कट झालं आहे. काळही जणू थांबलाय, स्तब्ध झालाय या निसर्गोत्पन्न प्रणयाचा सोहळा अनुभवण्यासाठी. ही प्रणयाची आर्तता संतोषण्यासाठी या रतीला फक्त मदनाचीच प्रतीक्षा आहे.

उत्तान शृंगार रसातलं हे तीन कडव्यांचं गीत वाचताना डोळ्यासमोरून एक शृंगारिक दृश्यच तरळत जातं.

वाहणाऱ्या हलक्या हवेच्या झुळुकेने शयनगृहाचे पारदर्शक पातळ पडदे डोलत आहेत.. कोपऱ्यातील समईच्या ज्योतीचा प्रकाशही जणू त्या नशेला पूरक ठरत आहे आणि अशा वातावरणात पुरुष स्पर्शासाठी सैरभैर झालेली ती विवस्त्र रमणी प्रियकराची वाट पाहत आहे… असे हे शब्द चित्र डोळ्यासमोरून झरकन जाते.

हे गीत वाचल्यानंतर क्षणभर तरी कुठल्याही नियमशास्त्राच्या आधारे त्याची तोडफोड करावी असं वाटलंच नाही. फक्त डोळे मिटावेत आणि कवीच्या तरल शब्दांची नशा अनुभवावी.

प्रतिभा, व्युत्पत्ती, अलंकार, छंद, वृत्त या काव्य कारणांना काव्य शास्त्रात खूप महत्त्व आहे आणि हे तंत्र प्रणयार्त या गीतात अगदी तंतोतंत साधलेले आहे.

मयूर पिसांचा चंदन मंचक प्रणयातुर झाला, हिरमुसली होऊन बैसली फडताळी कंचुकी, ज्योत समयिची निरखुन बघते अनवरत्या देहा, प्रणय दग्धता भाजून काढी अवघ्या शयनगृहा..

या काव्यपंक्तीत सहज होणारा चेतना गुणक्त्ती या अलंकाराचा अविष्कार केवळ सुंदर!

शिवाय हिरमुसली होऊन बसली फडताळी कंचुकी*या ओळीतील *हिरमुसली कंचुकी ही शब्दरचनाही खूप सूचक आहे. अंगावरची वस्र उतरवताना स्वाभाविक स्त्रीलज्जा किंवा संकोच व्यक्त करण्यासाठी योजिलेला हिरमुसली हा शब्द अतिशय कौशल्याने, काव्याचे सौंदर्य सांभाळून कवीने हलकेच वेचला आहे.

या गीतात कवीने ज्या मदनशरांचा उल्लेख केला आहे त्याबद्दल थोडा विचार करूया.

कामदेवाची अस्त्रे म्हणजे धनुष्य व बाण आहेत. त्याचे धनुष्य इक्षु दंडाचे (उसाचे) अत्यंत लवचिक असे आहे. रक्त कमल, नील कमल, आम्रमंजरी, अशोक पुष्प व मोगरा ही पाच गंधपुष्पे म्हणजे त्याचे पाच बाण आहेत. संमोहन, उन्मादन शोषण, तापन, स्तंभन हे सारे मदनाचे बाण आहेत. आणि कामक्रीडे मध्ये त्या त्यावेळी त्यांच्या अर्थपूर्ण सहाय्यकारी भूमिका आहेत. हे सर्व नीट अभ्यासले असता कवीने या गीतात केलेला मदन शरांचा उल्लेख औचित्यपूर्ण वाटतो.

कलिका आणि भुंगा ही प्रतीकात्मक रूपके आहेत. आणि ती स्त्री-पुरुषांच्या शृंगारिक अवयवांसाठी(कामेंद्रियांसाठी) सूचकतेने वापरलेली आहेत. तसेच कमलदलातला भुंगा हा लाक्षणिक अर्थाने संभोगाची कल्पना मांडतो.

गवसणीस सोडून बैसला तानपुरा मोकळा…. या काव्यपंक्तीत चेतना गुणोक्ती अलंकारासोबत हळुवारपणे विवस्त्रता व्यक्त करणारं रूपकही आहे. तानपुरा या शब्दात “तिच्या कायेची कमनीयता” दडलेली आहे. आणि गवसणी म्हणजे देहावरची वस्त्रे. लाक्षणिक अर्थाने वापरलेले हे शब्द काव्यरचनेला वेगळेच सौंदर्य प्राप्त करुन देतात.

हे संपूर्ण गीत मी जस जसे वाचत गेले आणि एकेका शब्दांची यथामती फोड करत गेले तेव्हा डॉक्टर श्रोत्रींच्या अचाट कल्पना बुद्धीची आणि सौंदर्य दृष्टीची झालेली जाणीव थक्क करणारी वाटली.

वास्तविक काव्यशास्त्रात शृंगार हा अत्यंत महत्त्वाचा रस आहे आणि कवींचाही शृंगार रस हा आवडताच आहे. मूळातच कामविकार हे सर्वसामान्य माणसाच्या दंपती जीवनात उद्भवतातच आणि सामाजिक व कौटुंबिक जीवनात कामशांतीचे महत्त्वही तितकेच आहे.

शृंगार समयी स्री आणि पुरुष यांच्या भावना निराळ्या असतात. शृंगारा अंती पुरुषाला जाणवते ती असीम तृप्ती. मात्र स्रीच्या बाबतीत तसे नसते. ती तृप्त न होता अधिक आर्त होते. आणि या गीतात ही आर्तता अतिशय तरल शब्दात कवीने टिपली आहे. हे विशेष आहे.

श्रृंगार रसाचा साहित्य कृतीमध्ये वापर करणे हे येरा गबाळ्याचे काम नव्हे. शब्दांच्या वापराला इथे खूप महत्त्व आहे. शृंगारमय प्रसंगाचे वर्णन करताना शब्दांची जर घसरण झाली तर सारी कलाकृती सवंग, अश्लील, आघळपघळ, ओंगळवाणी, अवाचनीय होईल. पण डॉक्टर श्रोत्रींचा शब्दप्रवाह हा चांदण्यासारखा शीतल आहे, तरल आहे, सुंदर आहे. सूचक आणि भावदर्शी आहे. मोगर्‍याची फुलं उधळावीत इतका सुखद आहे. त्यामुळे शृंगारतलं निसर्गतत्व त्यांनी अत्यंत आध्यात्मिक रित्या मांडलय म्हणूनच त्यांचं हे गीत म्हणजे मला शिंपला उघडून मोती उचलावा इतकं सुंदर वाटलं आणि वाचक हो! तुम्हालाही ते तसेच जाणवेल याची मला खात्री आहे.

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

radhikabhandarkar@yahoo.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ शतजन्म शोधिताना या नाट्यगीता चे रसग्रहण ☆ रसग्रहण – प्रा. भारती जोगी ☆

प्रा. भारती जोगी

 काव्यानंद

☆  शतजन्म शोधिताना या नाट्यगीता चे रसग्रहण ☆ रसग्रहण – प्रा. भारती जोगी ☆

(सावरकर पुण्यतिथी दि.२६ फेब्रुवारी निमित्त…)

संगीत नाटकांच्या वैभवशाली परंपरेत सुवर्णाक्षरांनी कोरलेलं नाव म्हणजे सावरकरांनी, मा. दीनानाथ मंगेशकर यांच्यासाठी लिहिलेली अजरामर नाट्यकृती “ संन्यस्त खड्ग ! “ १८ सप्टेंबर १९३१ या दिवशी या नाटकाचा पहिला प्रयोग झाला. आता शतकाकडे वाटचाल सुरू झाली आहे याची! 

या नाट्यकृतीतल्या… वैश्विक अनुभूती आणि एका वेगळ्याच विरहानुभूतीचा स्पर्श लाभलेल्या, भैरवी रागातल्या अवीट आणि अमीट सुरांची झालर असलेल्या एका नाट्य पदाचे रसग्रहण करण्याचा प्रयत्न मी करणार आहे. खरंतर सावरकरांच्या भावना, कल्पना आणि विचारांचं… उदात्त, उन्नत आकाश दोन बोटांच्या चिमटीत धरणं, सामावणं शक्यच नाही. पण तरीही हे शिवधनुष्य… काही क्षणांपुरतं का असेना… पेलून बघणार आहे…

नाट्यपद…

शत जन्म शोधितांना। शत आर्ति व्यर्थ झाल्या। 

शत सूर्य मालिकांच्या। दीपावली विझाल्या |

*

तेव्हा पडे प्रियासी| क्षण एक आज गांठी |

सुख साधना युगांची| सिद्धीस अंती गाठी। 

*

हा हाय जो न जाई| मिठी घालू मी उठोनी |

क्षण तो क्षणात गेला | सखी हातचा सुटोनी |

हे नाटक गौतम बुद्धांच्या काळाशी संबंधित आहे. बुद्धांच्या सांगण्यावरुन ‘शाक्य’ सेनापती विक्रमसिंह आणि शाक्य जनता, शस्त्र त्याग करून संन्यास घेतात. काही काळ जातो. दरम्यान विक्रमाचा मुलगा वल्लभ सुलोचना नावाच्या युवतीशी प्रेमविवाह करतो. लग्नाला वर्ष उलटल्यानंतर वल्लभ आणि सुलोचना यांच्या मिलनाचा / भेटीचा योग येतो. आणि… तो बहुप्रतिक्षित मधुर मिलनाचा क्षण येतो… पण हाय रे दैव! 

त्याचवेळी, कोसल देशाचा राजा… विद्युतगर्भ याने आक्रमण केल्याची वार्ता येते आणि शाक्य राष्ट्राला वाचवण्यासाठी, वल्लभालाही पाचारण केले जाते. कपिलवस्तुचा पाडाव टळावा म्हणून संन्यस्त खड्गाला आवाहन केले जाते. वल्लभही मग संन्यास धर्माचा संन्यास घेत… युद्धात उतरतो. म्हणून नाटकाचं नाव.. “संन्यस्त खड्ग!!”

मिलनाच्या क्षणीच झालेली ताटातूट, त्यामुळे सुलोचनेच्या मनाची झालेली अवस्था, विरह वेदनेचे, हतोत्साहित, विकल, असहाय असे मनोभाव… सगळ्याच… विभाव, अनुभाव आणि संचारी भावांसह, रस निष्पत्ती पर्यंत पोहोचविणारं हे नाट्यपद!! 

 सुलोचना आपल्या प्रिय सखीला… नलिनीला, वल्लभाच्या ऐनवेळी असं निघून जाण्याने, तिच्या मनात उठलेलं भावनांचं वादळ, विचारांचा कल्लोळ… कथन करते आहे…. ते शब्दांकन म्हणजे हे पद! 

सुलोचना अगतिक होते आणि म्हणते… असा पती लाभावा म्हणून मी शत जन्म शोधत राहिले गं! त्यासाठी मी शत-शत/अगणित, आरती केल्या. परमेश्वराच्या आळवण्या केल्या. तो भेटावा म्हणून शतजन्म वाट पाहिली. पण सखी, बघ ना, काय झालं…

‘शत आर्ति व्यर्थ झाल्या, शत सूर्य मालिकांच्या दीपावली विझाल्या! ‘

… या ओळींमध्ये शब्द.. शत सूर्य मालिका…. सावरकरांचं विश्वाच्या भव्यतेचं आकर्षण आणि विराटतेची ओढ व्यक्त झाली आहे. उत्तुंग कल्पना शक्ती, आशयातील भावोत्कटता जाणवते आहे. त्यातूनच सुलोचनेची मनोवस्था डोळ्यासमोर येते. ‘ दीपावली विझाल्या ‘ यातला विझाल्या हा अगदी अनवट असा शब्द प्रयोग…. तिच्या मनातले, मिलनोत्सुक आशेचे… शत-शत दीप विझले.. हे सूचित करतो… अगदी प्रत्यक्षानुभूतीच दिलीयं!

पुढील ओळीत सुलोचना म्हणतीये…

‘ तेव्हा पडे प्रियासी, क्षण एक आज गांठी!

सुख साधना युगाची, सिद्धीस अंति गाठी!‘

… या ओळी म्हणजे… यमक आणि श्लेष या दोन्ही अलंकाराच्या गाठभेटीचा उत्तुंग आणि उत्कट क्षण!! 

प्रिय मिलनाचा, शत जन्म वाट पाहिलेला क्षण, आज गांठी आला, गाठला एकदाचा, प्राप्त झाला, मिळाला…. असं वाटतंय! आणि मनात एकच विचार येतोयं की… शतजन्माच्या माझ्या साधनेने, सिध्दी गाठली. साधना आणि सिद्धीची गाठ पडली!! प्रिय आराधना, तपस्या, साधना सफल झाली.

 गाठी या शब्दांत, यमक आणि श्लेष या भाषालंकारांचा उपयोग करून… या पदातल्या, सुलोचनेच्या भावनांची अगदी… ये हृदयीचे, ते हृदयी…. म्हणजे प्रेक्षक वृंद हृदयी… गाठी घातली अंती… हीच भावना येते.

शेवटच्या दोन ओळी तर… कल्पनेची उत्तुंगता, आशयघनता, शब्दकळा, आणि भावनोत्कटता या सगळ्याचाच परिपूर्ण, परिपक्व, परिणाम म्हणावा ! 

सुलोचना सांगतीये… अगदी सजीव, सगुण, साकार दर्शन… त्या एका कृतीची साक्षात्कारी अनुभूती देत की…

हा हाय जो न जाई, मिठी घालू मी उठोनी

क्षण तो क्षणात गेला, सखी हातचा सुटोनी!! 

… सखी, बघ ना, तो मधुर मिलनाचा क्षण आला… मी उठून माझ्या वल्लभाला मिठी घालायला गेले… आणि… आणि, निमिषार्धात्.. तो क्षण.. क्षणात निसटून गेला गं माझ्या हातून.. अगदी काही कळायच्या आत!… किती ही वैश्विक अनुभूती! आध्यात्मिक किनार लाभलेली! कुठेतरी याच ओळी आठवतात… ‘ पाया पडू गेले तव, पाऊलचि ना दिसे!!! ‘ 

विरहाची काळ हा प्रदीर्घ भासतो, मात्र मिलनाचा काळ अत्यल्प भासतो.. असंही सुचवलयं ! ‘ क्षण तो क्षणात गेला…. ’ या सावरकरांच्या ओळीचं खरं मोल जाणून, भाषाप्रभू पु. ल. म्हणतात… ‘ या एका ओळीसाठी सावरकरांना नोबेल द्यायला हवं. ‘ 

हा खरा गौरव आहे त्या… ओळी सुचलेल्या क्षणांचा, सुलोचनेच्या हातून निसटलेल्या त्या हुरहुर लागलेल्या क्षणांचा ! 

या पदाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे… हे मिलनाच्या आधीचं नाही तर नंतरचं विरह गीत आहे. हे गाणं आपण ऐकतो तेव्हा एक विचित्र हुरहुर लागते. भैरवी रागातल्या सुरांची झालर असलेलं हे नाट्यपद… ‘आर्ति व्यर्थ झाल्या’ मधली आर्तता आणि ‘ क्षण तो क्षणात गेला ’ मधली क्षणभंगुरता स्पष्ट करतं… प्रेक्षकांच्या हाती मात्र खूप काही, मनाच्या गाभाऱ्यात स्थिरावून गेलं… असंच म्हणावसं वाटतं.

© प्रा. भारती जोगी

पुणे.                            

९४२३९४१०२४.📚📖🖋️

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ तुका म्हणे – जळो जैसा प्रेमरंग… – अभंग रचना ☆ रसग्रहण – प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? काव्यानंद ?

☆ तुका म्हणे – जळो जैसा प्रेमरंग… – अभंग रचना ☆ रसग्रहण – प्रा तुकाराम दादा पाटील ☆

तुका म्हणे

जळो जैसा प्रेम रंग / जया भुलोनि पतंग //१//

सासूसाठीं रडे सून / भाव अंतरीचा भिन्न //२//

मैंदा मुखीचा कोवळा / भाव अंतरी नीराळा //३ //

तैसी वृंदावनकांती / उत्तम धरूं नये हाती //४//

बक ध्यान धरी / दावी सोंग मत्स्य मारी //५ //

तुका म्हणे सर्प डुले / तैसा कथे माजी खुले // ५ //

– संत तुकाराम.

 *

तुका म्हणे

पतंग दिव्याच्या प्रकाशाने नटलेल्या लोभसवण्या ज्योतीच्या बाह्य स्वरूपावर भुलतो. प्रेमाने तिच्यावर झडप घालून मरून जातो. या प्रेमाला प्रेम कसे म्हणायचे. कायम जाच करणारी सासू मेली की सून हंबराडा फोडून रडताना दिसते. पण तिच्या रडण्याचा भाव खरा नसून भिन्न विचाराचा असतो. अतिशय मधूर आणि रसाळ वाणीत बोलणा-या कपटी माणसाच्या मनात कपटी कांगावाच भरलेला असतो. वृंदावन नावाचे वरून सुंदर दिसणारे फळ मनमोहक दिसते पण ते आतून कडवट व विषारी असते‌ त्याला आपण हातात सुध्दा धरू नये. जलाशयाच्या किंवा नदिच्या काठावर डोळे झाकून उभा असणारा बगळा पाहून तो जप तप ध्यान करतो आहे असे भासवतो पण तो तेथे मासे मारण्यासाठी उभा असतो. त्याच प्रमाणे हरीकथा किंवा किर्तन ऐकणारा नास्तिक माणूस पुंगी वाजताना ऐकून डुलणा-या सापासारखे सोंग करून दाखवत असतो. हे लक्षात घ्यावे आणि मगच तशा माणसाशी पुढील व्यवहार सावध होऊन करावेत.

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ तुका म्हणे – अणुरेणुया थोकडा… – अभंग रचना ☆ रसग्रहण – प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? काव्यानंद ?

☆ तुका म्हणे – अणुरेणुया थोकडा … – अभंग रचना ☆ रसग्रहण – प्रा तुकाराम दादा पाटील ☆

तुका म्हणे

 अणुरेणुया थोकडा / तुका आकाशात येवढा //१//

गिळूनी सांडिले कळिवर /भव भ्रमाचा आकार//२//

सांडिली त्रिपुटी/ दीप उजळला घटीं //३//

तुका म्हणे आता/ उरलों उपकारा पुरता //४//

– संत तुकाराम.

 *

तुका म्हणे

आपला आपल्याला आत्मसाक्षात्कार होणे ही फार कठीण गोष्ट आहे. तो अधिकार सहजा सहजी मिळत नाही. आत्मसाक्षात्कार झाल्यानंतर आपण खरे कोण आहोत याची आपल्याला जाणीव होते. तुकाराम महाराजांना परिपूर्ण ध्यानचिंतना नंतर ही अवस्था प्राप्त झाली होती. त्यांनी स्वतःला आजमावले होते. म्हणूनच ते म्हणतात.

अणुरेणुहून लहान असलेला तुकाराम आता आकाशा येवढा झाला आहे. कारण माझा देह म्हणजे या संसारात वावरणारा केवळ भवभ्रमाचा आकार आहे हे मी जाणले आहे. त्या देहालाच मी गिळून टाकले आहे. आता फक्त त्याचे कलेवर बाकी उरले आहे. त्यांच्यावर माझे आता पूर्ण नियंत्रण आहे. ते कलेवर आता मी माझ्या ताब्यात घेतले आहे. याचे एक कारण आहे. मला त्रिपुटीची जाणीव झाल्यावर मीच तिला ओलांडून तिच्या पलीकडे पोहोचलो आहे. ती मी सांडून टाकली आहे. त्यामुळेच मी कोण आहे हे दाखवणारी प्रकाशज्योत आता माझ्या घटात प्रज्वलित झाली आहे. मला दिसली आहे. त्या मुळेच माझ्या पुरताच असणारा मी आता संपून गेलो आहे. आता मी फक्त उपकारा पुरताच उरलो आहे.

परमेश्वर सर्व व्यापी आहे. आपल्यात आणि परमेशरात फारसा फरक उरलेला नाही अशा परमतत्वाची अनुभुती झाली की आपण अगदी क्षुल्लक आहोत याची जाणीव होते. आणि आपण आकाशायेवढे विशाल आहोत हे ही कळून चुकते. मग आपला देह त्यापुढे काहीच नाही याची जाणीव होते. त्याचा सर्व अभिमान गळून पडतो. देह फक्त कलेवरासारखा दिसू लागतो. आपल्यातल्या अहं भावनेचा अस्त होतो. मग वेगळ्या अलौकिक साक्षात्काराचे तेज प्रकटते. ते आपल्यात संचारते.

आणि आपल्यात उरते ती दुस-याला प्रेरणा आणि चैतन्य देण्याची भावना

* 

.© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ तुका म्हणे – विटाळ तो परद्रव्य परनारी… – अभंग रचना ☆ रसग्रहण – प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? काव्यानंद ?

☆ तुका म्हणे – विटाळ तो परद्रव्य परनारी… – अभंग रचना ☆ रसग्रहण – प्रा तुकाराम दादा पाटील ☆

तुका म्हणे

*

विटाळ तो परद्रव्य परनारी/

येथुनि जो दुरी तो सोंवळा//१//

 *

गद्य पद्य काहीं न धरावी उपाधी/

स्वाधिनची बुद्धि करुनी ठेवा//२//

 *

विचारांचे काही करा रे स्वहित/

पापपुण्यातीत भांडवल//३//

 *

तुका म्हणे न लगे जावें वनांतरा/

विश्व विश्वंभरा सारिखेचि//४//

– संत तुकाराम.

 *

तुका म्हणे

समाज सुसंस्कृत, नीतीमान, आणि परस्पराचे हीत जोपासणारा असायला हवा. त्यासाठी आपल्या आचारविचारावर आणि वर्तनावर आपलेच नियंत्रण असायला हवे. योग्य वर्तनाने आपण आपली आणि आपल्या समाजाची प्रगती करू शकतो. समाजाला शांतता व स्थिरता देवू शकतो. यासाठी तुकाराम महाराजांनी आपले वर्तन कसे असावे हे सांगताना महत्वाचे मार्गदर्शन केले आहे.

ते म्हणतात. परनारी आणि परद्रव्य यांना विटाळ समजून आपण आपले शुद्ध चारित्र्य सांभाळले पाहिजे. या बाबतीत तुम्हाला कुठल्याही ग्रंथातिल किंवा पोथ्यातील लिखीत मार्ग दर्शनाची गरज नाही. तुमच्या जवळ तुमची स्वतःची बुद्धी आहे. म्हणून तुम्हीच सारासार विचार करून योग्य निर्णय घ्यावयाचा आहे. याच विचाराने आपले हीत कशात आहे हे ठरवायचे आहे. तुमचे हीत आणि तुमचे पापपुण्य कशात आहे हे ठरवण्यासाठी तुमच्या बुद्धीचे महत्वाचे भांडवल तुमच्या जवळच आहे. त्याच्या योग्य वापराने तुम्ही स्वतःवर नियंत्रण ठेवावे. आणि आपले हीत साधावे. परमेश्वर प्राप्ती साठी रानावनात भटकण्याची गरज नाही. कारण हे जग म्हणजेच परमेश्वर आहे. दुस-याचे धन, दुस-याची पत्नी याना विटाळ माणने हाच देवाजवळ जाण्याचा साधा सोपा सरळ मार्ग आहे. त्यासाठी कोणत्याही पुराण श्रुती स्मृती यातील पुराव्यांची जरुरी नाही. तुमची बुद्धी जागृत ठेवा. हे सगळे विश्वच परमेश्वर आहे. कारण ते परमेश्वरानेच निर्माण केले आहे.

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ झटकून टाक जीवा… – कवी: ग. दि. माडगूळकर ☆ रसग्रहण.. सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆

सौ. ज्योत्स्ना तानवडे

? काव्यानंद ?

☆ झटकून टाक जीवा… – कवी: ग. दि. माडगूळकर  ☆ रसग्रहण.. सौ.ज्योत्स्ना तानवडे  ☆ 

झटकून टाक जीवा…

गदिमा

‘जीवन हे अनमोल ‘

आयुष्याच्या वाटचालीत चढउतार येतातच. सुख-दुःख, यश अपयशाचा पाठशिवणीचा खेळ सतत सुरूच असतो. अशावेळी धीराने, संयमाने संकटांचा सामना करावा लागतो. त्यातूनच पुढचा मार्ग सापडून यशाला गवसणी घालता येते. पण काहीजण अशावेळी धीर खचून गलितगात्र होतात. काही जण तर आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतात. अशा अवस्थेत त्यांना मायेची साथ, प्रोत्साहनाचे शब्द, आधारचा हात पाठबळ देणारा असतो. संकटांनी, दु:खाने खचलेल्या मनाला उभारी देणारे अलौकिक शब्दप्रभू कविवर्य ग. दि. माडगूळकर यांचे एक गीत मला फार आवडते. त्याच गीताचा रसास्वाद आपण घेऊया.

झटकून टाक जीवा दुबळेपणा मनाचा

फुलला पहा सभोवती आनंद जीवनाचा ||

*

होईल ताप काही मध्यान्हीच्या उन्हाचा

अविचार सोड असला कोल्हाळ कल्पनांचा

आस्वाद घे सुखाने येत्या नव्या क्षणांचा ||

*

पुष्पास वाटते का भय ऊनपावसाचे

आयुष्य त्यास आहे एकाच ना दिसाचे

हसुनी करी परी ते वर्षाव सौरभाचा ||

*

का कालचा उद्याला देसी उगा हवाला

द्यावाच वाटतो ना मग जीव रे जीवाला

अव्हेर काय करिसी अनमोल या तनाचा ||

*

झटकून टाक जीवा दुबळेपणा मनाचा

फुलला पहा सभोवती आनंद जीवनाचा ||

*

‘मधुचंद्र’ या मराठी चित्रपटातील हे गीत आहे. अगदी विमनस्क स्थितीतला नायक आत्महत्या करायला निघालेला असतो. त्याला वाटेत एकजण भेटतो. तो त्याची विचारपूस करून अगदी योग्य रीतीने समजूत घालतो.

तो सांगतो, ” अरे हे जग एवढे वाईट नाही. प्रलय करणारं पाणी सुद्धा शेत पिकवतं, वीज खेळवतं. लक्षात ठेव, दिलेली एकच गोष्ट परत घेता येत नाही कधी, ती म्हणजे आपला ‘जीव’….” त्याच्या समजावण्याने भारावलेला नायक मागे फिरतो. या पार्श्वभूमीवर हे गीत ऐकू येते.

दुःखाने, संकटांनी उदास, निराश झालेल्या मनाला उभारी देणारे हे गीत आहे. जीवनाकडे बघण्याचा सकारात्मक, आशावादी, उत्साही दृष्टिकोन स्वीकारण्याचे आवाहन कवीने पहिल्याच ओळीत केले आहे ते श्रोत्यांच्या मनाला अगदी थेट भिडते.

दिवसभरामधे मध्यान्हीचे ऊन हे तसे त्रासदायकच असते. पण तो ताप सोसल्यावर पुन्हा सावलीचा लाभ होतोच. तसंच आयुष्यात दुःखाची धग सोसल्यावर पुन्हा सुखाची सावली मिळतेच. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत निराश होऊन चुकीचा काही निर्णय न घेता शांत रहायला हवे.असे केल्याने येणाऱ्या नव्या क्षणांचा शांतपणे सुखाने आनंद, आस्वाद घेता येतो.

छोटंसं नाजूक कोमल फुल ऊनपावसाची तमा न बाळगता दिमाखात डोलत असते. खरंतर आपलं आयुष्य एक दिवसाचं आहे हे त्याला माहीत असतं तरीही ते हसत रहातं, फुलत रहातं आणि सगळीकडे सुगंधाचा वर्षाव करीत दरवळत रहातं. आपलं आयुष्य तर कितीतरी मोठे असते. त्यामधे किती तरी चांगल्या गोष्टी आपण करू शकतो. आपल्या कार्यकर्तृत्वाने स्वतःला आनंद मिळवत इतरांना आनंद देऊ शकतो. कसे जगायला हवे हे कवीने सहजसोप्या आणि प्रभावी शब्दात सांगितले आहे.

कवीने पुढे विचारले आहे की, ” कालचा दिवस वाईट होता म्हणजे उद्याचा दिवसही वाईट असेल असे का समजायचे?  उद्या कदाचित वेगळे पण चांगले काही घडू शकेल. तुला जर जीव द्यायचा असेल तर तो इतरांना दे. इतरांशी संवाद साधत मनाने जोडला जा. यातून जीवाला जीव देणारे सुहृद भेटतील. त्याऐवजी चुकीचा काही तरी विचार करुन घातक निर्णय घेऊ नकोस. माणसाचा जन्म मोठ्या भाग्याने मिळतो. तर अविचाराने या देहाचा अव्हेर करू नकोस. आत्महत्या हा संकटातून सुटण्याचा मार्गच नाही तर परिस्थितीवर मात करायला हवी. आपोआप सुखाचा मार्ग गवसेल हे कवीने खूप प्रभावीपणे समजून सांगितले आहे.

मन निराश असताना खूप अडचणींनी उदासी जाणवते, जगणे व्यर्थ वाटू लागते अशावेळी कुणीतरी आपुलकीने आपली चौकशी केली, आपले बोलणे निदान ऐकून घेतले तरी बरे वाटते. त्यामुळे आता आपली परिस्थिती बदलेल, आपलेही प्रश्न सुटू शकतील अशी आशा वाटू लागते. गेलेला उत्साह परत येतो. एक जिव्हाळ्याची व्यक्ती हे काम अतिशय उत्तम रीतीने करते. अगदी तसेच काम कविवर्य ग. दि. माडगूळकर यांचे शब्द करतात. जिवलग मित्राने दिलासा द्यावा आणि आपला आत्मविश्वास पुन्हा परत यावा तसे हे गाणे ऐकल्यावर वाटते.

जगण्यातला आनंद मावळत चाललाय, जगण्याविषयीची आशा संपत चालली आहे अशा लोकांना आशेचा नवा किरण दाखवणारे हे गीत आहे. गदिमांनी अतिशय सुंदर समर्पक शब्दांत मनाला उभारी देणारी रचना केली आहे. त्यासाठी मध्यान्हीचे ऊन आणि नाजूक फुल यांच्या रूपकातून जीवनाचे सार अगदी चपखल शब्दात सांगितले आहे.

आजचं जीवन धकाधकीचं, धावपळीचं आणि ताणतणावाचं झालेलं आहे. अनेकदा संकटांनी, दु:खाने माणसे अगदी त्रासून जातात. मानसिक स्वास्थ्य हरवते. मन निराश होऊन चुकीचा निर्णय घेऊ लागते. काहीजण तर आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतात. असे मनाने पूर्ण निराश झालेल्या लोकांना जगण्याची नवी प्रेरणा, आशेचा नवा किरण दाखवणारे हे गीत आहे.

जीवनामधे आशावाद भरभरून वाहतोय. तेव्हा सर्व संकटांना, आव्हानांना सामोरे जात जीवन समरसून जगायला हवे असा संदेश या गीतातून दिलेला आहे. जगण्याची सकारात्मक प्रेरणा देणारे हे गीत तसे खूप जुने आहे. पण आजही ते तितकेच परिणामकारक सिद्ध होते आहे ही कविवर्य गदिमांच्या शब्दांची थोरवी आहे.

परिस्थितीने गांजलेल्या एखाद्या जीवाला त्यातून बाहेर पडण्याची प्रेरणा मिळो हीच सदिच्छा आहे.

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

१०/०८/२०२३

वारजे, पुणे.५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ तुका म्हणे – विठ्ठल गीती गावा… – अभंग रचना ☆ रसग्रहण – प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? काव्यानंद ?

☆ तुका म्हणे – विठ्ठल गीती गावा … – अभंग रचना ☆ रसग्रहण – प्रा तुकाराम दादा पाटील ☆

तुका म्हणे

काव्यानंद

*

विठ्ठल गीतीं गावा विठ्ठल चित्तीं ध्यावा /

विठ्ठल उभा पहावा विटेवरीं //१//

अनाथांचा बंधु विठ्ठल कृपासिंधु /

तोडी भवबंधु यमपाश //२//

*

तोचि शरणागतां विठ्ठल मुक्तिदाता /

विठ्ठल या संतासमागमें //३//

*

विठ्ठल गुणनिधि विठ्ठल सर्व सिद्धी/

लागली समाधी विठ्ठल नामें //४//

*

विठ्ठलाचें नाम घेतां जालें सुख/

गोडावलें मुख तुका म्हणे//५//

– संत तुकाराम.

 *

तुका म्हणे

आपल्या आवडीच्या आराध्य दैवताचे गुणवर्णन करताना तुकाराम महाराज आपले देहभान विसरून त्यांच्या नामघोषात तल्लीन होऊन जातं असतं. विठ्ठलाचे नामस्मरण का करावे याची कारणे सांगताना महाराज म्हणतात ”

आपण आपल्या ध्यानीमनी विठ्ठल साठवावा. त्याची विटेवर समचरणात उभी असणारी मुर्ती मनचक्षु समोर सतत ठेवावी आणि आपल्या मुखाने त्याचेच गीत गात त्याचे गुणगान करावे. कारण तो अनाथांचा बंधु आहे. म्हणून त्याला दीनबंधू म्हणतात. तो करूणाकर आहे. कृपेचा सागर आहे. तो भवबंधच नाही तर आपल्या भोवती असणारे यमपाशही सहज तोडून टाकतो. तो शरण येणार-या भक्तास सहज मुक्ती मिळवून देतो. आणि संतांच्या संगतीत तो रममाण झालेला असतो. विठ्ठल सर्व गुणसंपन्न आहे. त्याच्या चरणीच आपण त्याचे नामस्मरण करत समाधीस्त झालो तर आपणासही सर्व सिद्धी प्राप्त होतील. विठ्ठलाचे नुसते नामस्मरण केले तरी सर्व सुखे मिळतात आणि मुखाला आपोआपच गोडी येते. अशी पराकोटीची भक्ती केल्याशिवाय ईश्वर प्राप्ती होत नाही.

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares