☆ तुका म्हणे – विटाळ तो परद्रव्य परनारी… – अभंग रचना ☆ रसग्रहण – प्रा तुकाराम दादा पाटील ☆
☆ तुका म्हणे ☆
*
विटाळ तो परद्रव्य परनारी/
येथुनि जो दुरी तो सोंवळा//१//
*
गद्य पद्य काहीं न धरावी उपाधी/
स्वाधिनची बुद्धि करुनी ठेवा//२//
*
विचारांचे काही करा रे स्वहित/
पापपुण्यातीत भांडवल//३//
*
तुका म्हणे न लगे जावें वनांतरा/
विश्व विश्वंभरा सारिखेचि//४//
– संत तुकाराम.
*
तुका म्हणे
समाज सुसंस्कृत, नीतीमान, आणि परस्पराचे हीत जोपासणारा असायला हवा. त्यासाठी आपल्या आचारविचारावर आणि वर्तनावर आपलेच नियंत्रण असायला हवे. योग्य वर्तनाने आपण आपली आणि आपल्या समाजाची प्रगती करू शकतो. समाजाला शांतता व स्थिरता देवू शकतो. यासाठी तुकाराम महाराजांनी आपले वर्तन कसे असावे हे सांगताना महत्वाचे मार्गदर्शन केले आहे.
ते म्हणतात. परनारी आणि परद्रव्य यांना विटाळ समजून आपण आपले शुद्ध चारित्र्य सांभाळले पाहिजे. या बाबतीत तुम्हाला कुठल्याही ग्रंथातिल किंवा पोथ्यातील लिखीत मार्ग दर्शनाची गरज नाही. तुमच्या जवळ तुमची स्वतःची बुद्धी आहे. म्हणून तुम्हीच सारासार विचार करून योग्य निर्णय घ्यावयाचा आहे. याच विचाराने आपले हीत कशात आहे हे ठरवायचे आहे. तुमचे हीत आणि तुमचे पापपुण्य कशात आहे हे ठरवण्यासाठी तुमच्या बुद्धीचे महत्वाचे भांडवल तुमच्या जवळच आहे. त्याच्या योग्य वापराने तुम्ही स्वतःवर नियंत्रण ठेवावे. आणि आपले हीत साधावे. परमेश्वर प्राप्ती साठी रानावनात भटकण्याची गरज नाही. कारण हे जग म्हणजेच परमेश्वर आहे. दुस-याचे धन, दुस-याची पत्नी याना विटाळ माणने हाच देवाजवळ जाण्याचा साधा सोपा सरळ मार्ग आहे. त्यासाठी कोणत्याही पुराण श्रुती स्मृती यातील पुराव्यांची जरुरी नाही. तुमची बुद्धी जागृत ठेवा. हे सगळे विश्वच परमेश्वर आहे. कारण ते परमेश्वरानेच निर्माण केले आहे.
आयुष्याच्या वाटचालीत चढउतार येतातच. सुख-दुःख, यश अपयशाचा पाठशिवणीचा खेळ सतत सुरूच असतो. अशावेळी धीराने, संयमाने संकटांचा सामना करावा लागतो. त्यातूनच पुढचा मार्ग सापडून यशाला गवसणी घालता येते. पण काहीजण अशावेळी धीर खचून गलितगात्र होतात. काही जण तर आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतात. अशा अवस्थेत त्यांना मायेची साथ, प्रोत्साहनाचे शब्द, आधारचा हात पाठबळ देणारा असतो. संकटांनी, दु:खाने खचलेल्या मनाला उभारी देणारे अलौकिक शब्दप्रभू कविवर्य ग. दि. माडगूळकर यांचे एक गीत मला फार आवडते. त्याच गीताचा रसास्वाद आपण घेऊया.
झटकून टाक जीवा दुबळेपणा मनाचा
फुलला पहा सभोवती आनंद जीवनाचा ||
*
होईल ताप काही मध्यान्हीच्या उन्हाचा
अविचार सोड असला कोल्हाळ कल्पनांचा
आस्वाद घे सुखाने येत्या नव्या क्षणांचा ||
*
पुष्पास वाटते का भय ऊनपावसाचे
आयुष्य त्यास आहे एकाच ना दिसाचे
हसुनी करी परी ते वर्षाव सौरभाचा ||
*
का कालचा उद्याला देसी उगा हवाला
द्यावाच वाटतो ना मग जीव रे जीवाला
अव्हेर काय करिसी अनमोल या तनाचा ||
*
झटकून टाक जीवा दुबळेपणा मनाचा
फुलला पहा सभोवती आनंद जीवनाचा ||
*
‘मधुचंद्र’ या मराठी चित्रपटातील हे गीत आहे. अगदी विमनस्क स्थितीतला नायक आत्महत्या करायला निघालेला असतो. त्याला वाटेत एकजण भेटतो. तो त्याची विचारपूस करून अगदी योग्य रीतीने समजूत घालतो.
तो सांगतो, ” अरे हे जग एवढे वाईट नाही. प्रलय करणारं पाणी सुद्धा शेत पिकवतं, वीज खेळवतं. लक्षात ठेव, दिलेली एकच गोष्ट परत घेता येत नाही कधी, ती म्हणजे आपला ‘जीव’….” त्याच्या समजावण्याने भारावलेला नायक मागे फिरतो. या पार्श्वभूमीवर हे गीत ऐकू येते.
दुःखाने, संकटांनी उदास, निराश झालेल्या मनाला उभारी देणारे हे गीत आहे. जीवनाकडे बघण्याचा सकारात्मक, आशावादी, उत्साही दृष्टिकोन स्वीकारण्याचे आवाहन कवीने पहिल्याच ओळीत केले आहे ते श्रोत्यांच्या मनाला अगदी थेट भिडते.
दिवसभरामधे मध्यान्हीचे ऊन हे तसे त्रासदायकच असते. पण तो ताप सोसल्यावर पुन्हा सावलीचा लाभ होतोच. तसंच आयुष्यात दुःखाची धग सोसल्यावर पुन्हा सुखाची सावली मिळतेच. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत निराश होऊन चुकीचा काही निर्णय न घेता शांत रहायला हवे.असे केल्याने येणाऱ्या नव्या क्षणांचा शांतपणे सुखाने आनंद, आस्वाद घेता येतो.
छोटंसं नाजूक कोमल फुल ऊनपावसाची तमा न बाळगता दिमाखात डोलत असते. खरंतर आपलं आयुष्य एक दिवसाचं आहे हे त्याला माहीत असतं तरीही ते हसत रहातं, फुलत रहातं आणि सगळीकडे सुगंधाचा वर्षाव करीत दरवळत रहातं. आपलं आयुष्य तर कितीतरी मोठे असते. त्यामधे किती तरी चांगल्या गोष्टी आपण करू शकतो. आपल्या कार्यकर्तृत्वाने स्वतःला आनंद मिळवत इतरांना आनंद देऊ शकतो. कसे जगायला हवे हे कवीने सहजसोप्या आणि प्रभावी शब्दात सांगितले आहे.
कवीने पुढे विचारले आहे की, ” कालचा दिवस वाईट होता म्हणजे उद्याचा दिवसही वाईट असेल असे का समजायचे? उद्या कदाचित वेगळे पण चांगले काही घडू शकेल. तुला जर जीव द्यायचा असेल तर तो इतरांना दे. इतरांशी संवाद साधत मनाने जोडला जा. यातून जीवाला जीव देणारे सुहृद भेटतील. त्याऐवजी चुकीचा काही तरी विचार करुन घातक निर्णय घेऊ नकोस. माणसाचा जन्म मोठ्या भाग्याने मिळतो. तर अविचाराने या देहाचा अव्हेर करू नकोस. आत्महत्या हा संकटातून सुटण्याचा मार्गच नाही तर परिस्थितीवर मात करायला हवी. आपोआप सुखाचा मार्ग गवसेल हे कवीने खूप प्रभावीपणे समजून सांगितले आहे.
मन निराश असताना खूप अडचणींनी उदासी जाणवते, जगणे व्यर्थ वाटू लागते अशावेळी कुणीतरी आपुलकीने आपली चौकशी केली, आपले बोलणे निदान ऐकून घेतले तरी बरे वाटते. त्यामुळे आता आपली परिस्थिती बदलेल, आपलेही प्रश्न सुटू शकतील अशी आशा वाटू लागते. गेलेला उत्साह परत येतो. एक जिव्हाळ्याची व्यक्ती हे काम अतिशय उत्तम रीतीने करते. अगदी तसेच काम कविवर्य ग. दि. माडगूळकर यांचे शब्द करतात. जिवलग मित्राने दिलासा द्यावा आणि आपला आत्मविश्वास पुन्हा परत यावा तसे हे गाणे ऐकल्यावर वाटते.
जगण्यातला आनंद मावळत चाललाय, जगण्याविषयीची आशा संपत चालली आहे अशा लोकांना आशेचा नवा किरण दाखवणारे हे गीत आहे. गदिमांनी अतिशय सुंदर समर्पक शब्दांत मनाला उभारी देणारी रचना केली आहे. त्यासाठी मध्यान्हीचे ऊन आणि नाजूक फुल यांच्या रूपकातून जीवनाचे सार अगदी चपखल शब्दात सांगितले आहे.
आजचं जीवन धकाधकीचं, धावपळीचं आणि ताणतणावाचं झालेलं आहे. अनेकदा संकटांनी, दु:खाने माणसे अगदी त्रासून जातात. मानसिक स्वास्थ्य हरवते. मन निराश होऊन चुकीचा निर्णय घेऊ लागते. काहीजण तर आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतात. असे मनाने पूर्ण निराश झालेल्या लोकांना जगण्याची नवी प्रेरणा, आशेचा नवा किरण दाखवणारे हे गीत आहे.
जीवनामधे आशावाद भरभरून वाहतोय. तेव्हा सर्व संकटांना, आव्हानांना सामोरे जात जीवन समरसून जगायला हवे असा संदेश या गीतातून दिलेला आहे. जगण्याची सकारात्मक प्रेरणा देणारे हे गीत तसे खूप जुने आहे. पण आजही ते तितकेच परिणामकारक सिद्ध होते आहे ही कविवर्य गदिमांच्या शब्दांची थोरवी आहे.
परिस्थितीने गांजलेल्या एखाद्या जीवाला त्यातून बाहेर पडण्याची प्रेरणा मिळो हीच सदिच्छा आहे.
☆ तुका म्हणे – विठ्ठल गीती गावा … – अभंग रचना ☆ रसग्रहण – प्रा तुकाराम दादा पाटील ☆
☆ तुका म्हणे ☆
काव्यानंद
*
विठ्ठल गीतीं गावा विठ्ठल चित्तीं ध्यावा /
विठ्ठल उभा पहावा विटेवरीं //१//
अनाथांचा बंधु विठ्ठल कृपासिंधु /
तोडी भवबंधु यमपाश //२//
*
तोचि शरणागतां विठ्ठल मुक्तिदाता /
विठ्ठल या संतासमागमें //३//
*
विठ्ठल गुणनिधि विठ्ठल सर्व सिद्धी/
लागली समाधी विठ्ठल नामें //४//
*
विठ्ठलाचें नाम घेतां जालें सुख/
गोडावलें मुख तुका म्हणे//५//
– संत तुकाराम.
*
तुका म्हणे
आपल्या आवडीच्या आराध्य दैवताचे गुणवर्णन करताना तुकाराम महाराज आपले देहभान विसरून त्यांच्या नामघोषात तल्लीन होऊन जातं असतं. विठ्ठलाचे नामस्मरण का करावे याची कारणे सांगताना महाराज म्हणतात ”
आपण आपल्या ध्यानीमनी विठ्ठल साठवावा. त्याची विटेवर समचरणात उभी असणारी मुर्ती मनचक्षु समोर सतत ठेवावी आणि आपल्या मुखाने त्याचेच गीत गात त्याचे गुणगान करावे. कारण तो अनाथांचा बंधु आहे. म्हणून त्याला दीनबंधू म्हणतात. तो करूणाकर आहे. कृपेचा सागर आहे. तो भवबंधच नाही तर आपल्या भोवती असणारे यमपाशही सहज तोडून टाकतो. तो शरण येणार-या भक्तास सहज मुक्ती मिळवून देतो. आणि संतांच्या संगतीत तो रममाण झालेला असतो. विठ्ठल सर्व गुणसंपन्न आहे. त्याच्या चरणीच आपण त्याचे नामस्मरण करत समाधीस्त झालो तर आपणासही सर्व सिद्धी प्राप्त होतील. विठ्ठलाचे नुसते नामस्मरण केले तरी सर्व सुखे मिळतात आणि मुखाला आपोआपच गोडी येते. अशी पराकोटीची भक्ती केल्याशिवाय ईश्वर प्राप्ती होत नाही.
☆ तुका म्हणे – भवसिंधूचे हेचि तारू… – अभंग रचना ☆ रसग्रहण – प्रा तुकाराम दादा पाटील ☆
☆ तुका म्हणे ☆
☆
कोणाच्या आधारें करूं मी विचार/
कोण देईल धीर माझ्या जीवा//१//
*
शास्त्रज्ञ पंडित नव्हें मी वाचक /
यातिशुद्ध एक ठाव नाहीं//२//
*
कलियुगीं बहु कुशळ हे जन /
छळितील गुण तुझे गातां //३//
*
मज हा संदेह झाला दोन्हीं सवा /
भजन करूंं देवा किंवा नको //४//
*
तुका म्हणे आतां दुराविता जन /
किंवा हे मरण भले दोन्ही//५//
☆
– संत तुकाराम.
तुका म्हणे
आपल्या सभोवताली निर्माण झालेले सामाजिक वातावरण पाहून त्याच्या वर वैतागलेले तुकाराम महाराज देवालाच म्हणतात. अशा या जाचातून जाणा-या कठीण काळात कोणाच्या आधारावर कोणता विचार करू? या नाजूक वेळी मला कोण आधार देईल. मी कोणी फार मोठा शास्त्रज्ञ पंडित किंवा वाचकही नाही. तसेच मी उच्च कुळात जन्मलो की नाही नाही हेही मला निपटणे ठाऊक नाही.
या कलियुगात लोक फारच कुशल, हुशार आणि चाणाक्ष झाले आहेत. मी तुझे गुणगान करतो. तुझी मनोभावे पूजा करतो. केवळ तुझेच नामस्मरण करतो. म्हणून त्यांनी माझा छळवाद मांडला आहे. म्हणूनच माझ्या मनात त्यांच्या विषयीचा संदेह आणि संशय आता बळावत चालला आहे. तेव्हा मी तुझे भजन पूजन आणि नामस्मरण करावे की नको हे आता तूच मला सांग. माझ्या मनाला आता कठीण पेच पडला आहे. मी हे माझे कार्य बंद केले तर जन लोकांसोबत जोडलेला माझा संपर्क हरवून बसेन. लोक माझ्यापासून दूर जातील ते मला नको आहे. तुझे नामस्मरण बंद करणे आणि जनलोकांपासून दूर जाणे या दोन्ही गोष्टी मला मरणा सारख्याच वाटतात. आता या पेचातून तुझ्या वाचून माझी सुटका कोणीही करू शकत नाही. तुकाराम महाराजाना छळणा-या लोकांच्या होणा-या त्रासामुळे ते किती हैराण झाले होते हे यावरून कळते. म्हणूनच त्यांनी आपली व्यथा इतरांना न सांगता ती प्रत्यक्षात देवापुढेच मांडली आहे.
☆ तुका म्हणे – पुढीलाचे इच्छी पळ… – अभंग रचना ☆ रसग्रहण – प्रा तुकाराम दादा पाटील ☆
☆ तुका म्हणे ☆
*
पुढिलाचें इच्छी पळ /
नाहीं बळ ते अंगीं //१//
*
संत गेले तया ठाया /
देवराया पाववीं //२//
*
जेष्ठांची कां आम्हा जोडी /
परवडी न लभे //३//
*
तुका म्हणे करीं कोड /
पुरवी लाड आमुचा //४//
– संत तुकाराम.
*
तुका म्हणे
तुकाराम महाराजांनी स्वतःच अंतर्मुख होऊन स्वतःला पूर्ण रुपाने जणून घेतले होते. आपल्याच आपल्यावर पडलेल्या मर्यादा ते ओळखून होते. म्हणून अगदी खुलेपणाने मनमोकळे व्यक्त होताना ते म्हणतात. मनात खूप काही प्रबळ इच्छा आहेत. पण त्या इच्छांचे मिळणारे फळ प्राप्त करून घेण्यासाठी लागणारे बळ मात्र अंगी नाही. महान संत जेथे पोहचले तेथे आपणही पोहचावे असे सारखे वाटत रहाते ते आपणाकडून मला मिळावे म्हणूनच मी आपणाकडे आलो आहे. त्यासाठी तुम्ही मला पावन व्हावे. या बाबतीत जेष्ठ आणि श्रेष्ठ असणा-या मंडळीची जोड मला मिळाली तर आयुष्यभर आमची होणारी परवड तरी टळेल. येवढ्यासाठी तरी देवा तुम्ही मला पावन व्हा आणि माझे लाड पुरवणारे व्हा.
मनात बाळगलेले ध्येय गाठण्यासाठी पाठीशी ईश्वरी कृपा असलीच लागते. येवढ्याच साठी महाराज देवाकडे ही आग्रहाची मागणी करत आहेत.
☆ तुका म्हणे – काय उणे जाले… – अभंग रचना ☆ रसग्रहण – प्रा तुकाराम दादा पाटील ☆
☆ तुका म्हणे ☆
*
काय उणें जालें तुज समर्थासी /
जसा मजपाशीं कोण दोष //१//
*
जो तूं माझा न करिसिं अंगीकार/
सांगेन वेव्हार संतांमधी //२//
*
तुजविण रत आणिकाचें ठयीं /
ऐसें कोण ग्वाही दावीं मज //३//
*
तुका म्हणे काय धरुनी गुमान /
सांग उगवून पांडुरंगा //४//
– संत तुकाराम.
*
तुका म्हणे
तुकाराम महाराज आपल्या अधीकार वाणीने आपल्या वर्तनात विषयी प्रत्यक्ष पांडुरंगालाच जाब विचारताना म्हणतात. तू पूर्ण समर्थ आहेस.
तू सर्व काही जाणतोस. माझ्या वर्तनामुळे तुला मी कोणता त्रास देतोय?. ज्या मुळे तू माझा स्वीकार करत नाहीस. ते कारण तू मला सांग. नाही तर हा तुझा माझ्या सोबत घडत असलेला व्यवहार काही योग्य नाही असे मी सगळ्या संतमंडळी समोर सांगेन. मी केवळ तुझ्याच चरणाशी लीन होवून तुझीच मनोभावे सेवा करत आहे. मी तुला सोडून दुस-या कुणाची भक्ती करत असल्यास त्याचा तू मला सबळ पुरावा दे. तो माझ्या समोर आण. या बाबतीत तू मौन पाळून गप्प बसू नकोस. तू माझा स्वीकार का करत नाहीस. हे मला आता कळायलाच हवे. या वरून तुकाराम महाराज पांडुरंगाची किती मनोभावे आणि श्रद्धापुर्वक सेवा करत होते ते कळते. त्या मुळेच ते पांडुरंगावर आपला हक्क आहे असे मानत होते. त्याला आपले मनोगत सांगत होते. पांडुरंगाचे मार्गदर्शन घेऊन आपला जीवनक्रम चालवीत होते. हेच यातून आपल्या सारख्या सामान्य माणसाला कळून येते.
☆ तुका म्हणे – कोणाच्या आधारे करू मी विचार… – अभंग रचना ☆ रसग्रहण – प्रा तुकाराम दादा पाटील ☆
☆ तुका म्हणे ☆
काव्यानंद
कोणाच्या आधारें करूं मी विचार/
कोण देईल धीर माझ्या जीवा//१//
*
शास्त्रज्ञ पंडित नव्हें मी वाचक /
यातिशुद्ध एक ठाव नाहीं//२//
*
कलियुगीं बहु कुशळ हे जन /
छळितील गुण तुझे गातां //३//
*
मज हा संदेह झाला दोन्हीं सवा /
भजन करूंं देवा किंवा नको //४//
*
तुका म्हणे आतां दुराविता जन /
किंवा हे मरण भले दोन्ही//५//
– संत तुकाराम.
*
तुका म्हणे
आपल्या सभोवताली निर्माण झालेले सामाजिक वातवरत पाहून त्याच्या वर वैतागलेले तुकाराम महाराज देवालाच म्हणतात.अशा या जाचातून जाणा-या कठीण काळात कोणाच्या आधारावर कोणता विचार करू. या नाजूक वेळी मला कोण आधार देईल.मी कोणी फार मोठा शास्त्रज्ञ पंडित किंवा वाचकही नाही.तसेच मी उच्य कुळात जन्मलोयकी नाही हेही मला निपटणे ठाऊक नाही.
या कलियुगात लोक फारच कुशल आणि हुशार आणि चाणाक्ष झाले आहेत.मी तुझे गुण गाणं करतो. तुझी मनोभावे पूजा करतो. केवळ तुझेच नामस्मरण करतो . म्हणून त्यांनी माझा छळवाद मांडला आहे. म्हणूनच माझ्या मनात त्यांच्या विषयीचा संदेह आणि संशय आता बळावत चालला आहे. तेव्हा मी तुझे भजनपुजन आणि नामस्मरण करावे की नको हे आता तूच मला सांग. माझ्या मनाला आता कठीण पेच पडला आहे. मी हे माझे कार्य बंद केले तर जन लोकासोबत जोडलेला मी माझा संपर्क हरवून बसेन. लोक माझ्यापासून दूर जातील ते मला नको आहे. तुझे नामस्मरण बंद करणे आणि जनलोकापासून दूर जाणे या दोन्ही गोष्टी माला मरणा सारख्याच वाटतात. आता या पेचातून तुझ्या वाचून माझी सुटका कोणीही करू शकत नाही. तुकाराम महाराजाना छळणा-या लोकांच्या होणा-या त्रासामुळे ते किती हैराण झाले होते हे यावरून कळते. म्हणूनच त्यांनी आपली व्यथा इतराना न सांगता ती प्रत्यक्षात देवापुढेच मांडली आहे .
☆ तुका म्हणे – तुज जसा कोणी… – अभंग रचना ☆ रसग्रहण – प्रा तुकाराम दादा पाटील ☆
☆ तुका म्हणे ☆
*
तुज जसा कोण उदाराची रासी/
आपुलेंचि देसी पद दासा //१//
*
शुद्ध हीन कांहीं न पाहासु कुळ /
करिसी निर्मळ वास देहीं //२//
*
भावें हें कदान्न खासी त्याचे घरी/
आमट्यांच्या परी नावडती //३//
*
नवजासी जेथें दुरी दवडितां /
न तेही जो चित्ता योगियाच्या//४//
*
तुका म्हणे ऐसीं ब्रीदे तुझी खरीं /
बोलतील चारी वेद मुखें //५//
*
तुका म्हणे
तुकाराम महाराज देवाला त्याची ओळख करून देताना देवालाच अत्यंत आदराने म्हणतात, देवा या जगात तुझ्या सारखा तूच उदार मनाचा आहेस. कारण तू तुझे पद तुझ्या दासालाही सहजपणे देवून टाकतोस. जेव्हा तू हे करतोस तेव्हा तू ज्याला तुझे पद देतोस तेव्हा त्याची जात, कुळी, धर्म काय आहे हे पाहून भेदभव मुळीच करत नाहीस. फक्त ज्याचा देह निर्मळ आणि मन शुद्ध आहे की नाही तेवढेच पहातोस. शुद्ध आणि निर्मळ मनाच्या भक्ताच्या घरचे कदान्न ही तू आवडीने खातोस. पण जो अभक्त आहे त्याच्या घरचे तुला काहीही चालत नाही. तुला आवडतही नाही. नवागत भक्ताने तुझी मनोभावे भक्ती करायला सुरवात केलेल्या भक्ताला तू तुझ्या पासून त्याला दूर लोटताना कोणत्याही महान योगी पुरुषाला कधीच आढळले नाही. दिसले ही नाही.असा तुझा स्वभाव दिलदार आहे. ते तुझे ब्रीदच आहे. असे मी म्हणत नाही तर चारी वेद त्यांच्या मुखाने हेच सातत्याने बोलतात. देवाची ही खरीखुरी ओळख महाराज आपल्याला स्वानुभवातून सांगतात. आणि देवानेही कधी कोणत्याही स्वरूपाचा भेदभाव पाळलेला नाही हे सप्रमाण दाखवून देतात. मग सामान्य माणसांनी, महापंडित व महान योगी पुरुषांनी तरी तो का पाळावा. समतेचा आणि समानतेचा केवढा महान विचार महारज किती सहजतेने सांगून जातात.आणि त्याचा किती मोठा परिणाम होतो हे सहजपणे लक्षात येते.
आजही समाजात स्त्रीची हीच प्रतिमा आहे किंबहुना समाजाला स्त्रीचं हेच रूप अपेक्षित आहे, मान्य आहे.
हजारो वर्षांपासून स्त्रीच्या दुःखात, वेदनेत, समस्येत फारसा मूलभूत फरक झालेला जाणवत नाही आणि असलाच फरक तर तो केवळ एक मुलामा आहे. खोटा, वरवररचा. आत मध्ये मात्र तेच जळणं, तोच अंगार. अशाच अर्थाची, माननीय कवयित्री सौ. सुमती पवार यांची “दुःख वाटे चावळावे.. ” ही स्त्री वेदना व्यक्त करणारी आणि मनातले धुमसणारे निखारे फुलवणारी एक अतिशय वास्तववादी सुरेख कविता वाचनात आली. याच कवितेचा रसास्वाद आज आपण घेऊया.
☆ दु:ख वाटे चावळावे… ☆
सुखदु:ख वाटे चावळावे, चघळती त्या बायका
चटके मनावर ओरखडे दाविती ना बायका..
*
ते रोज मरणे रोज जगणे मार बुक्यांचा बसे
लावूनी कुलूपे बसती त्या का करूनी घ्यावे वाटे हसे?
*
परी फुटतो बांध अवचित कधी पाणवठी वा वावरी
संताप होतो व्यक्त कृतीतून रडवेली होते, हासरी..
*
खोचून काचा साडीचा तो आपटून कापडे
साचलेला मळ निघतो मुखातून अंगार पडे..
*
बरसती अंगारासवे नयनातूनी लाह्या जणू
आसवे पाण्यात पडती सरिता सागरी जणू..
*
मोकळे मग आकाश होते पिळुनी आणखी मुक्तते
घेऊन उसना चेहरा मग ती घरी पुन्हा सामावते..
*
कधी न कळते अथवा वळते गेंडासमाजास ती
बंद ओठांवरही चालते रानटी मिजास ती…
*
वळकटी होते तिची मग करकचून ती बांधती
पेटत्या चितेत मग ती पूर्ण होते सारी रिती..
*
रानटी तो प्राक्तनाचा लिहिणारा धनी असे
काय जळते कोणाचे ते अनुभवावाचूनी ….
कळणार कसे? …. *
– प्रा. सौ. सुमती पवार नाशिक
कविता वाचल्यानंतर प्रथम डोळ्यासमोर येते ती संसाराचा गाडा निमुटपणे, विनातक्रार, कष्टाने, मानहानी सोसत ओढणारी एक ग्रामीण स्त्री! तिचं जग म्हणजे गावचा पाणवठा, नदीचा किनारा अन् तिथेच भेटणारी समदु:खी माणसं!
सुखदुःख वाटे चावळावे चघळती त्या बायका
चटके मनावर ओरखडे दाविती ना बायका
कशा असतात बायका! जरी कितीही वाटलं चुकतमाकत, तुटकपणे, अडखळत का होईना मनातलं खुपणारं जगाला सांगावं पण दुःख गिळण्याची सवय लागलेल्या या स्त्रिया स्वतःच्या मनावरचे चटके, ओरखडे लपवतच राहतात. आहे त्या परिस्थितीत जगत राहतात.
कवितेच्या या पहिल्या चरणात स्त्री कशी शोषित आहे याचं दर्शन होतं. *चावळावे* *चघळतती* हे शब्द तोच काव्यभाव अत्यंत परिणामकारक पद्धतीने व्यक्त करतात.
ते रोज मरणे रोज जगणे मारबुक्क्यांचा बसे
लावूनी कुलूपे बसती त्या करून घ्यावे वाटे हसे?
कधी शब्दांचा, कधी शारीरिक लाथा बुक्क्यांचा मार खात जगणं म्हणजे एक प्रकारचं रोजचं मरणच पण तरी “हाताची घडी आणि तोंडावर बोट” या पद्धतीने कुठेच व्यक्त व्हायचं नाही, बोलायचं नाही कारण बोललं, तक्रार केली तर त्यातून साधणार काहीच नाही. बदनामी मात्र होणार. हे कायमस्वरूपी भय उराशी बाळगतच ही अत्याचारित स्त्री जगत असते पण कधीतरी याचा स्फोट होतोच ना? अति होतं आणि बांध फुटतो. कसा? कशा रीतीने? त्याचं काळीज फाटणारं वर्णन कवयित्रीने पुढच्या चरणात केलं आहे.
तरी फुटतो बांध अवचित कधी पाणवठी वा वावरी
संताप होतो व्यक्त कृतीतून रडवेली होते हासरी..
गावात एखादा पाणवठा असतो. नदीचा किनारा असतो अथवा एखादं शेत असतं जिथे ती मोलमजुरी करते. ही सारी ठिकाणं म्हणजे तिच्यासाठी कधीतरी मन मोकळं करण्याची माध्यमं असतात. साऱ्याच पीडित असतात म्हणूनच एकमेकींची सुखदुःखं जाणू शकतात. रडवेली मनं मोकळी होतात. क्षणभर का होईना तिच्या मुखावर मग हास्य विलसते.
तिच्या मनातली खदखद, संताप कसा कृतीतून व्यक्त होतो त्याचं बोलकं चित्र सुमतीताई पुढच्या चरणात आकारतात.
खोचून काचा साडीचा तो आपटून कापडे
साचलेला मळ निघतो मुखातून अंगार पडे
ढीगभर धुणं घेऊन ती पाणवठ्यावर आलेली आहे. धुताना कपडे दगडावर आपटत असताना तिच्या मनातला संताप, उद्विग्नता तडतडणार्या ठिणग्यांप्रमाणे बाहेर पडते. जसा कपड्यातून मळ बाहेर येतो तसाच तिच्या मनातही कित्येक दिवस साठलेला मळ, कचरा बाहेर पडतो.
या चरणात “कापडं धुणं” हे अतिशय चपखलपणे रूपकात्मक पद्धतीने कवयित्रीने इथे मांडलं आहे. जशी एखादी पंचींग बॅग असावी.
स्त्री जीवनाशी निगडित असलेली ही रोजची सर्वसाधारण कृती तिच्या दुःखाला वाट फोडणारंं एक प्रभावशाली माध्यम कसं होऊ शकतं हे अत्यंत साध्या तरीही परिणामकारक शब्दात कवयित्री सुमतीताईंनी मांडलं आहे. हा चरण वाचताना अंगावर अक्षरशः शहरा येतो आणि कुठेतरी मनाला काटेही बोचतात.
बरसती अंगारासवे नयनातूनी लाह्या जणू
आसवे पाण्यात पडती सरिता सागरी जणू
मोकळे मग आकाश होते पिळुनि आणखी मुक्त ते
घेऊन उसना चेहरा मग ती घरी पुन्हा सामावते
एकीकडे ती आपटून धोपटून कपडे धूते, त्यातला मळ काढते आणि शेवटी ते घट्ट पिळते. ही प्रत्येक कृती प्रतिकात्मक आहे. तिच्या मनात साठलेला प्रचंड संताप, उद्रेक, चीड या प्रत्येक कृतीतून अगदी स्वाभाविकपणे बाहेर पडते. तिच्या मनात फुटणाऱ्या त्या संतप्त विचारांच्या लाह्या टणटणतात. तिच्या डोळ्यातून अश्रू ही ओघळत राहतात. वाहत्या पाण्यात तेही सामावून जातात. जशी नदी सागराला मिळावी त्याप्रमाणे. तिचे अश्रू त्या पाण्याशी एकरूप होतात. तो पाण्याचा प्रवाह तिच्या अश्रूंना उदरात घेतो. अशा रीतीने तीही मुक्त होते! मोकळी होते. ” झालं मोकळं आभाळ” अशी तिची हलकी मनस्थिती होते आणि मग ती पुन्हा तिचा तोच उसना हसरा चेहरा घेऊन घरी परतते.
या काव्यपंक्ती वाचताना वाचकांचे मन भळभळतं. इथे “स्वभावोक्ती” अलंकार अतिशय सुंदरपणे कवयित्रीने साधलेला आहे. पाणवठ्यावर धगधगणारं मन घेऊन कपडे धुणारी ही व्यथित ग्रामीण स्त्री अक्षरश: डोळ्यासमोर साकारते. आणि नकळत तिच्या डोळ्यातून ओघळणारे अश्रू आपण पुसावेत असे वाचकालाही वाटते.
कधी न कळते अथवा वळते
गेंडा समाजास ती
बंद ओठावरही चालते
रानटी मिजास ती..
वळकटी होते तिची मग करकचून ती बांधती
पेटत्या चितेत मग ती पूर्ण होते
सारी रिती…
समाज इतका बोथट, बथ्थड, संवेदन शून्य आहे की त्याला तिचं दुःख कळून घ्यायचंच नाही, कळलं तरी वळत नाही अशीच या भावना शून्य समाजाची स्थिती आहे. उलट स्त्री म्हणजे केवळ उपभोग्य वस्तू. तिला मन आहे, तिच्यात एक आत्मा आहे याची ना दखल ना जाणीव. काय होतं तिच्या साचून ठेवलेल्या यावेदनांचं? फक्त एक वळकटी. आयुष्य सरतं. अखेर करकचून बांधलेली वळकटी धगधगत्या चितेतच रिकामी, निवांत होते. आयुष्यभर जळणाऱ्या तिच्या दुःखाला मरण हाच एकमेव जणू आसरा असतो, थांबा असतो. तिच्या मरणातच तिची शांती असते.
रानटी तो प्राक्तनाचा लिहिणारा धनी असे
काय जळते कोणाचे ते अनुभवावाचूनी कळणार कसे
शेवटच्या चरणात मात्र हतबलता, हताशपणा जाणवतो. ज्या कुणाच्या गळ्यात ती तिच्या आयुष्याची माळ घालते तो तिचा धनीच तिचे भागधेय ठरवतो. तिच्या नशिबाची रेषा तोच आखतो आणि ती निमुटपणे, मिटल्या इंद्रियाने सारे स्वीकारते. तिच्या जळण्याने कुणाचे काही जळत नाही, बिघडत नाही. तिच्या दुःखापर्यंत खरं म्हणजे कोणीच पोहोचत नाही. ज्याचं जळतं त्यालाच कळतं. अनुभव नसलेल्यांना ते कसे जाणवणार? त्यांची फक्त वरवरची सहानुभूती असेल. त्यात थोडीच अंतःकरणाची तडतड असेल?
संपूर्ण मुक्तछंदातली ही कविता वाचल्यानंतर मन कमालीचं सुन्न होतं. या कवितेत एक उपहास आहे जो मन फाडणारा आहे. मात्र कवयित्री सुमती ताईंच्या प्रत्येक शब्दातून झिरपणारी तिची वास्तववादी व्यथा, “स्त्रीचं मन एक स्त्रीच जाणू शकते. ” या निष्कर्षापर्यंत नक्कीच आणून सोडते. शिवाय या कवितेतली वेदना, व्यथा मोठी की ती व्यथा जीवनभर सोसणारी सोशिक स्त्री मोठी हे ठरवता येत नाही पण तरीही या कवितेतून पाझरणारं जे स्त्रीरूप आहे ते कधी बदलेल का? बदलता येईल का? हा प्रश्न मात्र मनात उभा राहतो. कवितेतील गावकुसाकडची स्त्री समस्त पीडित नारीजातीचंच अशाप्रकारे प्रतिनिधीत्त्व करते.
☆ तुका म्हणे – दैव तुम्हां अवघें आहे… – अभंग रचना ☆ रसग्रहण – प्रा तुकाराम दादा पाटील ☆
☆ तुका म्हणे ☆
सदैव तुम्हां अवघें आहे /
हातपाय चालाया //१//
*
मुखी वाणी कांनीं कीर्ती /
डोळे मूर्ति देखावया //२//
*
अंध बहिर ठकलीं किती /
मूकी होती पांगुळ //३//
*
घरा आगी लावुनि जागा /
न पळे तो गा वांचेना //४//
*
तुका म्हणे जागा हिता /
कांहीं आता आपुल्या//४//
– संत तुकाराम.
*
तुका म्हणे
देवाने तुम्हाला चालता पळता यावे म्हणून हातपाय दिलेत. त्यांचा उपयोग करून तुम्ही स्वतःचालायला शिका.
तुम्हाला बोलता यावे यासाठी तूमच्या मुखात वाणी ठेवली आहे. तुमचीच कीर्ती ऐकण्यासाठी कानही दिलेले आहेत. आंधळे बहिरे पांगळे असे कितीतरी अभागी जीवही येथे आहेत. तेही जगतातच की. मग तुम्ही धडधाकट असूनही स्वतःच्या हिताचा विचार का करत नाही. तुम्ही जागे असतानाच तुमच्या स्वतःच्या घराला आग लावता आणि वाचण्यासाठी तेथून पळून ही जात नाही मग असा माणूस कसाकाय वाचेल बरं. अशा वेळी आपल्या हिताचा विचार करायला नको का? आपण स्वतः ज्या गोष्टी करत आहेत त्या आपल्या आणि आपल्या समाजाच्या हिताच्या नाहीत. आपल्या कुटुंबाच्या हिताच्या नाहीत हे तुम्हाला माहिती असूनही तुम्ही त्या का टाळत नाही. कारण आपण खोटया मोह मायेच्या जाळ्यात पुरते अडकून पडलेले असतो आणि जाणूनबुजून त्या गोष्टी करत बसतो. म्हणजे आपणच आपल्या घराला आग लावत असतो. घराला आग लागली आहे आता आपण आपल्याला वाचायला येथून दूर पळायला पाहिजे हे ठाउक असूनही आपण तसे करत नाही. आपण अशा चुकीच्या ब-याच गोष्टी जाणूनबुजून करत असतो. त्यांचा त्याग करत नाही. सारे काही माहिती असते पण मोह सोडवत नाही. असे जर वागलात तर शेवटी तुमच्या नशिबी कपाळमोक्ष येईल. म्हणून स्वताच्या हिताचा विचार करा. देवाने जे दिले आहे त्याचा उपयोग करा. सन्मार्गाला लागा. आणि नामसंकीर्तनात रंगून जा. तेच तुमच्या हिताचे ठरेल.