मराठी साहित्य – काव्यानंद ☆ “उचलला हारा..” – कवयित्री : बहिणाबाई चौधरी – रसग्रहण : अनंत गद्रे ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? काव्यानंद ?

☆ “उचलला हारा..” – कवयित्री : बहिणाबाई चौधरी – रसग्रहण : अनंत गद्रे ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆


उचलला हारा… बहिणाबाईंची कविता

उचलला हारा, हारखलं मन भारी ।

निजला हार्‍यात, तान्हा माझा शिरीहारी ।।

डोईवर हारा, वाट मयाची धरली ।

भंवयाचा मया, आंब्याखाले उतरली ।।

 *

उतारला हारा, हालकलं माझं मन ।

निजला हार्‍यात, माझा तानका ‘सोपान’ ।।

 *

लागली कामाले, उसामधी धरे बारे ।

उसाच्या पानाचे, हातीपायी लागे चरे ।।

 *

ऐकूं ये आरायी, धांवा धांवा घात झाला ।

अरे, धांवा लव्हकरी, आंब्याखाले नाग आला ।।

 *

तठे धांवत धांवत, आली उभी धांववर ।

काय घडे आवगत, कायजांत चरचर ।।

 *

फना उभारत नाग, व्हता त्याच्यामधीं दंग ।

हारा उपडा पाडूनी, तान्हं खेये नागासंगं ।।

 *

हात जोडते नागोबा माझं वांचव रे तान्हं ।

अरे, नको देऊं डंख, तुले शंकराची आन ।।

 *

आतां वाजव वाजव, बालकिस्ना तुझा पोवा ।

सांग सांग नागोबाले, माझा आयकरे धांवा ।।

 *

तेवढ्यांत नाल्याकडे, ढोरक्याचा पोवा वाजे ।

त्याच्या सूराच्या रोखानं, नाग गेला वजेवजे ।।

 *

तव्हां आली आंब्याखाले, उचललं तानक्याले ।

फुकीसनी दोन्हीं कान, मुके कितीक घेतले ।।

 *

देव माझा रे नागोबा, नही तान्ह्याले चावला ।

सोता व्हयीसनी तान्हा, माझ्या तान्ह्याशीं खेयला ।।

 *

कधीं भेटशीन तव्हां, व्हतील रे भेटी गांठी ।

येत्या नागपंचमीले, आणीन दुधाची वाटी ।।

………

कवितेतल्या मोजक्या काही ओळीत किती सहजपणे एक थरारक प्रसंग उभा केला आहे बहिणाबाईंनी!

यातले काही शब्द भुरळ घालणारे आहेत.

प्रसंगाचे कथन असल्याने व कवितेत सांगायचा आहे म्हटल्यावर जिथून या प्रसंगास सुरवात झाली त्यानेच कवितेची देखील.

‘उचलला हारा’…

डोक्यावरच्या हाऱ्यात बाळ झोपलाय. म्हणून ‘शिरीहारी’. श्रीहरी नाही. किती गोड वाटते ते ऐकायला. अन कविता गातांना मिटर चुकला असते बहुतेक.

अन वाट मयाची धरल्ये. मयाची…म्हणजे मळ्याची.

आंब्याखाली हारा ठेवला. मनात कालवाकालव झाली. त्या बाळाला तसे तिथे एकट्याला सोडून उसाच्या फडात कामाला जातांना.

काम करतांना उसाची धारदार पाती हातापायास चरे पाडत होती.

आणि इतक्यात..

इतक्यात मोठ्या आवाजात ‘आरायी’ म्हणजे आरोळी ऐकू आली “धावा रे धावा! आंब्या खाली नाग निघालाय”

आंब्याखाली नागोबा?????

हे ऐकताच चर्र झाले. अरे देवा हे काय घडतंय. धावंतच पोहोचले आंब्याशी. पहाते तर काय? हारा पालथा पाडून बाळ व नागोबा दोघेही दंग आहेत खेळण्यात! तान्हं खेये नागासंग. अरे बापरे!

 

हात जोडले नागोबाला. शपथ घातली त्याला. तुला शंकराची शप्पथ आहे नागोबा. डंख नको मारू माझ्या सोपानाला.

आणि धावा केला त्या ‘बालकिसना’चा, बाळकृष्णाचा. अरे वाजव तुझा पावा, अन बोलाव त्या नागाला तुझ्याकडे. ऐक रे माझे, वाजव तुझा पावा.

आणि हे मी बोलत्ये तोच…

नाल्यापलिकडून ‘ढोरक्याचा’, म्हणजे गुराख्याच्या बासरीचे सुर ऐकू येवू लागले. आणि मग त्या सुरांच्या जादूने त्या रोखाने नाग निघून गेला.

 

तो निघून जाताच मी धावले आंब्याकडे. तान्ह्याला उचलून घेतले. कवटाळले. कानांत त्याच्या फुंकरले. आणि चटचट मुके घेतले त्याचे.

“नागोबा! मी आजूबाजूस नव्हते. तू त्याला डसला नाहीस. देवच रे बाबा तू. स्वतः तान्हा झालास व माझ्या या तान्ह्यास खेळवलेस.

नागोबा.  होत राहील आपली भेट. आणि हो, येणाऱ्या नागपंचमीला तुझ्याकरता दुधाची वाटी मी येईन घेऊन!”

 

रसास्वाद : अनंत गद्रे

प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित

सांगली 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ फुलपाखरे… कवी : श्रीशैल चौगुले – रसग्रहण : अविनाश शिंदे ☆ प्रस्तुती – श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

? काव्यानंद ?

☆ फुलपाखरे… कवी : श्रीशैल चौगुले – रसग्रहण : अविनाश शिंदे ☆ प्रस्तुती – श्रीशैल चौगुले ☆

फुलपाखरे

इवली पिवळी फुलपाखरे

पिवळ्याशा दगडफुलांवर

सुंदर बागडती ईथे-तिथे

वारा ओला झेलीत दलांवर.

 *

पाती गवताची दवात मस्त

कधी वनात भ्रमण अनेक

ओहोळकाठी माळरानी कधी

मोहित मना फसवी अनेक.

 *

स्पर्श होता भिरभिरती भारी

रंग हाताला लावून उडती

पुन्हा बेभान पाठलाग त्यांचा

गवसणेचा हेतु ना घडती.

 *

भाव अंतरी असेच जीवनी

स्वप्नांच्या हृदयी फुलपाखरे

एकही न मनासारखे यश

रंग स्मृतींचे ते हरे-भरे.

 श्रीशैल चौगुले.

 श्रीशैल चौगुले यांची ‘फुलपाखरे’ ही कविता अत्यंत निसर्गरम्य, संवेदनशील आणि मानवी भावनांची सखोल उकल करणारी एक अप्रतिम रचना आहे.

कवितेच्या पहिल्याच कडव्यात पिवळ्या दगडफुलांवर बागडणारी पिवळी फुलपाखरे आणि ओला वारा झेलणारी त्यांची नाजूक पंखे यांचे अतिशय जीवंत आणि दृश्यमान चित्र उभे राहते. शब्दांमधून निसर्गाचा ताजेपणा स्पष्टपणे जाणवतो.

‘ओहोळकाठी’, ‘माळरानात’, ‘दवात मस्त गवताची पाती’ यांसारख्या शब्दांमुळे कवितेला एक निसर्गदत्त सौंदर्य प्राप्त झाले आहे. फुलपाखरांचा मागोवा घेताना मनाची होणारी मोहिनी आणि भ्रमंती कवीने खूप सुंदर टिपली आहे.

फुलपाखराला स्पर्श करताच ते हाताला रंग लावून भिरभिरत उडून जाणे आणि त्याच्या मागे बेभान होऊन धावणे… हा बालपणीचा किंवा मानवी स्वभावाचा नित्याचा अनुभव कवीने अतिशय साध्या पण प्रभावी शब्दांत मांडला आहे.

कवितेचा शेवट या रचनेला एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जातो. केवळ निसर्गाचे वर्णन न राहता, कवीने फुलपाखरांची तुलना माणसाच्या ‘स्वप्नांशी’ आणि ‘इच्छांशी’ केली आहे. आयुष्यात मनासारखे यश पकडू पाहताना ते फुलपाखरासारखे निसटून जाते, पण हातात किंवा आठवणींत मात्र त्याचे ‘रंग’ कायम राहतात, हा तत्त्वज्ञानाचा धागा अतिशय अर्थपूर्ण व भावुक करणारा आहे.

थोडक्यात सांगायचे तर –

ही कविता बाह्य निसर्गाच्या सौंदर्यातून मानवी आयुष्यातील स्वप्न आणि सत्याचा सुंदर मेळ घालते. कवीची कल्पकता, लयबद्धता आणि भावोत्कटता कौतुकास्पद आहे.

 

रसास्वाद: अविनाश शिंदे

प्रस्तुती: श्रीशैल चौगुले

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /मंजुषा मुळे/गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ धुंद वाऱ्या… कवी : डॉ. निशिकांत श्रोत्री ☆ रसग्रहण – नीलिमा खरे ☆

नीलिमा खरे

? काव्यानंद ?

☆ धुंद वाऱ्या… कवी : डॉ. निशिकांत श्रोत्री ☆ रसग्रहण – नीलिमा खरे ☆

आयुष्य उत्फुल्ल पणे, आनंदाने जगणे ही एक कला आहे. त्यासाठी अंतरीच्या भाव भावना जागृत असणे नितांत गरजेचे आहे. प्रत्येक गोष्टीकडे, आजूबाजूच्या परिसराकडे जाणीव पूर्वक पाहणे हा अनुभव खूप काही शिकवणारा असतो. असे करताना निसर्गाशी एकरूप न होणारे मन अतिशय विरळाच.. त्यातून ते जर कवी मन असेल तर भावनांची प्रतिबिंबे त्यात शब्द बध्द करणे हे ओघानेच आले. कधी आनंद देणारा तर कधी दुःख देणारा अनुभव कवितेत शब्दांकित होतो. असाच अनुभव व्यक्त करणारी “धुंद वाऱ्या” ही डॉ निशिकांत श्रोत्री सरांची कविता मनाला भुरळ घालते.

वाऱ्यावर वाऱ्यासवे विहरताना मन वाऱ्याप्रमाणे तरल झालेले असते. त्यात हा वारा धुंद करणारा असेल तर प्रीतीचे विचार मनामध्ये येणे साहजिक आहे. आणि मग ते काव्य रुपात प्रकट होताना डॉ श्रोत्री सरांसारख्या प्रतिभावंत कवीला प्रतिभेचे वेगळेच धुमारे गवसललेले दिसतात.

☆ धुंद वाऱ्या… ☆ कवी : डॉ. निशिकांत श्रोत्री ☆

धुंद वाऱ्या थांब येथे दूर तू जाऊ नको

गूज माझ्या अंतरीचे तू कुणा सांगू नको ||ध्रु||

*

गुपित जपले मन्मनी जे ते उगा पसरू नको

लाजरीचा रंग गाली तू नभा देऊ नको

*

दाटले माझ्या मनी साऱ्या जगा सांगू नको

गूज माझ्या अंतरीचे तू कुणा सांगू नको ||१||

*

भाव माझे तूच नेता मी सख्या सांगू कशी

शीळ होता बोल माझे मी मुकी राहू कशी

*

भाववेडी स्वप्नगंधी छेड तू काढू नको

गूज माझ्या अंतरीचे तू कुणा सांगू नको ||२||

*

अंतरी दाटून माझ्या तू तुला विसरून जा

विरून येथे तूच माझे स्वप्नही होऊन जा

*

आण माझ्या प्रीतीची रे अंतरी मोडू नको

गूज माझ्या अंतरीचे तू कुणा सांगू नको ||३||

२५ फेब्रुवारी १९८६

धुंद वाऱ्या हे शीर्षक कवीची वाऱ्याशी असलेली सलगी जाणवून देते. त्या वाऱ्याने कवी मनाला आगळी धुंदी प्राप्त झालेली आहे हे समजते. तसेच हा वारा स्वतः ही धुंद झालेला आहे हे लक्षात येते.

धुंद वाऱ्यामुळे धुंद होणारे कवी मन खुलून आले नाही तरच नवल!! अशा वातावरणात अपुले मन, त्यात जपलेल्या गूजाला/गुपिताला प्रकर्षाने उधाण येते. पण त्याच वेळी ते गूज दडविण्यास मन आतुर असते. ते कुणाला ही कळू नये अशी मनाची भावावस्था असते. अगदी हीच भावना सखोलपणे, सहजपणे कवी डॉ निशिकांत श्रोत्री यांनी या कवितेत व्यक्त केली आहे.

या कवितेत व्यक्त केलेल्या भावना स्री च्या आहेत हे कळते. भिन्नलिंगी काव्य रचताना कवी डॉ निशिकांत श्रोत्री स्त्री भावनांशी एकरुप होऊन तशा तऱ्हेने व्यक्त झाले आहेत. हे आवर्जून उल्लेख करण्यासारखे व तितकेच कौतुकास्पद ही !!

धुंद वाऱ्या थांब येथे दूर तू जाऊ नको

गूज माझ्या अंतरीचे तू कुणा सांगू नको ||ध्रु||

एखाद्या सख्याशी, मित्राशी बोलावे तसा संवाद वाऱ्याशी घडतो आहे. या धुंद करणाऱ्या वाऱ्याला ती विनंती करते की तू इथेच थांब. दूर कुठेही जाऊ नकोस. या धुंद वाऱ्यामुळे मनाला लाभलेली धुंदी तिला विसरायची नाहीये. कदाचित तिच्या मनातल्या गुपितामुळे ही वारा धुंद झाला असावा असे वाटत असावे.
लहरत, विहरत जाणाऱ्या वाऱ्यासवे मनातले गूज सर्व दूर पसरु नये अशी तिची इच्छा आहे. अतिशय सहजपणे सुलभ भाषेतून केलेले हे आर्जव आर्त भासते. व त्यातला खरेपणा अधोरेखित होवून तिची प्रांजळ भावना मनाला मोहविते. बोजड शब्दांना जाणीव पूर्वक दूर ठेवल्याने काव्य मनाला भावते. यथार्थ शब्दांनी गेयता लाभली आहे. वाऱ्याला थांबवताना लाभलेल्या धुंदीने ही थांबावे असा संकेत, संदेश जाणवतो.

गुपित जपले मन्मनी जे ते उगा पसरू नको

लाजरीचा रंग गाली तू नभा देऊ नको

दाटले माझ्या मनी साऱ्या जगा सांगू नको

गूज माझ्या अंतरीचे तू कुणा सांगू नको ||१||

ती वाऱ्याला म्हणते की तिच्या स्वतःच्या मनात जपलेले प्रीतीचे गूज मात्र उगाचच दूरवर पसरू नको. प्रीत भावनेच्या जाणीवेने लज्जेने गालांवर आलेली लाल गुलाबी लाली नभास देवू नको. यातला गर्भितार्थ फार सुंदर. तो अतिशय सूचकपणे मांडला आहे.. लाजरी शब्दावरील श्लेष मोहक.. अर्थाला अर्थ देणारा.. लाजरी ती स्वतः व लज्जा..
स्वप्नवत वाटणारी भावना तशीच शिल्लक राहू दे. रात्र सरु नये. व प्रातः काळी नभास उषेची लाली लाभू नये. ती तिच्या गालांवर तशीच राहावी असा अर्थ. रात्रीस जागणारी ही प्रेम भावना रात्रीच्या कुशीत तशीच निरंतर राहू दे.

माझ्या मनात दाटून आलेल्या प्रीत भावना माझ्या पुरत्या मर्यादित राहोत. त्या तू साऱ्या जगाला सांगू नको असे आर्जव करुन पुन्हा एकदा ती वाऱ्याला तिचे ते गुपित गुप्त ठेवण्याविषयी सांगत आहे. नको या नकारात्मक क्रियापदाचा वापर कवी मनाची प्रगल्भता दर्शवितो.. त्यातून गूज इतरांना कळू नये यासाठीची धडपड प्रकर्षाने जाणवते.. दाटले या शब्दाची योजना ही लक्ष व लक्ष्यवेधी.. साधारणपणे दाटले हा शब्द नकारात्मक विचार, भावना सूचित करतात. पण इथे प्रीतीची भावना दाटून आली असे म्हणताना प्रेम भावनेची सखोलता कळते. भावनेची व्यापकता व संपृक्तता जाणवते..

भाव माझे तूच नेता मी सख्या सांगू कशी

शीळ होता बोल माझे मी मुकी राहू कशी

भाववेडी स्वप्नगंधी छेड तू काढू नको

गूज माझ्या अंतरीचे तू कुणा सांगू नको ||२||

वाऱ्याला आहे तिथेच थांबण्याची आजर्वी विनंती ती अजूनही करतेच आहे.

पुढे ती म्हणते की माझ्या मनातले हे प्रीतीचे भाव जर तू वाऱ्यावरी वाहून नेले तर हे भाव, माझी ही प्रेम भावना मी माझ्या मुखाने माझ्या सखयाला कशी सांगणार? आणि ते तर मलाच त्याला सांगायचे आहे. तू विनाकारण लुडबूड करू नकोस अशी विनवणी करत थोडेसे दटावणी वजा सूचित करते.

ती पुढे वाऱ्याला जाणीव करून देते जर तिचे बोल त्याने (वाऱ्याने) व्यक्त केले तर ते बोल बोल ना राहता त्या बोलांची मधुर शीळ होईल व अशा वातावरणात ती तरी अबोल कशी राहू शकेल? तिची भावना व्यक्त न करता ती मूक कशी राहील? तिलाही काही बोलावे लागेल. बोलण्याने तिची ही स्वप्नवत धुंदी नाहीशी होईल याचे भय तिला वाटते.. पण मग अशी भावनेने वेडी झालेली व अश्या स्वप्नगंधात बुडालेली/डुबलेली छेड वाऱ्याने काढूच नये अशी विनंती ती करते.

व पुन्हा एकदा तिचे गूज त्याने पसरवू नये अशी आंतरीक भाक/ आण त्याला देते.

अंतरी दाटून माझ्या तू तुला विसरून जा

विरून येथे तूच माझे स्वप्नही होऊन जा

आण माझ्या प्रीतीची रे अंतरी मोडू नको

गूज माझ्या अंतरीचे तू कुणा सांगू नको ||३||

२५ फेब्रुवारी १९८६

या भाक देण्यापलीकडे जाऊन ती त्याला विनंती करते की या धुंद वाऱ्याने तिचे अंतर /हृदय दाटून यावे. अर्थात ही धुंद करणारी बेधुंद धुंदी तिच्या अंतःकरणात दाटून राहावी. वाऱ्याने स्वतःचे अस्तित्व विसरून जावे व तिच्या अंतरंगात विरून तिचे स्वप्न म्हणून सतत तिच्या डोळ्यांत/ हृदयात स्थान मांडून राहावे. अशा प्रकारे वागण्याची आण ती वाऱ्याला देत आहे. आणि विनवते आहे की ही तिची प्रीतीची आण त्याने त्याच्या हृदयातून त्याच्या अंतरातून मोडू नये. त्याने ही तिला तसाच प्रतिसाद द्यावा.
आण माझ्या प्रीतीची रे अंतरी मोडू नको या ओळीतील श्लेष कवीच्या साहित्यिक जाणीवांकडे निर्देश करणारा.. वाऱ्याने प्रीतीची आण त्याच्या अंतरातून तसेच तिच्या अंतरातली प्रीती ची आण मोडू नये असा अर्थ!!

या कवितेत धुंद वारा हा तिचा प्रियकरच असावा.. या वाऱ्याला चेतनागुणोत्तिचे रूप देऊन तसेच वाऱ्याचे रूपक योजून या कवितेच्या अर्थाला आगळा वेगळा आयाम दिला आहे..

सोपी परंतु तरीही कवितेतील भावनेला, आशयाला न्याय देणारी चपखल शब्दयोजना साधली आहे. त्याच वेळी माझ्या मनी, माझे मी मुके असे योजलेले अनुप्रास व त्या व्यतिरिक्त रुपक, श्लेष, चेतना गुणोक्ती, यमक इ. साहित्यिक अलंकारांनी ही कविता एक उत्तम भावगीत ठरते..
या कवितेला श्री विलास आडकर यांनी संगीतबद्ध केले आहे. व माधुरी सुतावणे यांनी नावाप्रमाणेच मधुर आवाजात गायले आहे.. हे गीत ऐकून रसिकजन मंत्रमुग्ध होतील यात शंका नाही..

धुंद वाऱ्यासवे पसरु नये अशी कामना करणारी कवितेतील धुंदी वाचकांच्या मनात घर करून राहते हे नक्की..

© नीलिमा खरे

६-५-२०२४

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /मंजुषा मुळे/गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ अवकाशाची सीमा… कवी – डॉ निशिकांत श्रोत्री ☆ रसग्रहण.. सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

? काव्यानंद ?

☆ अवकाशाची सीमा… कवी – डॉ निशिकांत श्रोत्री ☆ रसग्रहण.. सौ राधिका भांडारकर ☆

रसग्रहण. (गाथा नारी जन्माची)

एक काळ असा होता की मुलगी जन्माला आली की तिचे संगोपन करताना किंवा तिला वाढवताना आई-वडिलांच्या मनात महत्त्वाचा जर कुठला विचार असेल तर “आपली मुलगी वयात आल्यावर तिच्यासाठी एखादा चांगला कुटुंबस्थित जोडीदार पाहायचा आणि तिचा विवाह जमवून द्यायचा म्हणजे आपली जबाबदारी संपली.”

आणि हाच विचार मनाशी बाळगून ती एक सक्षम गृहिणी बनावी, सासर माहेरचा मान तिने वाढवावा असे संस्कार तिच्यावर केले जात. म्हणजे मुलगी म्हटली की तिला स्वयंपाकपाणी आणि घर कामाचे धडे प्रथम विनाअट घ्यावेच लागायचे. तिने किती शिकावे अथवा तिने तिच्या आवडीच्या क्षेत्रात प्रगती करावी की न करावी या सगळ्या आघाडीवर तिला मान्यता देण्याआधी या सगळ्यांमुळे तिचा विवाह जमवण्यात अडथळे निर्माण होऊ शकतात हा प्राथमिक पण प्रबळ विचार असायचा. थोडक्यात त्या काळात स्वतःचं अस्तित्व सिद्ध करणे ही स्त्रीच्या आयुष्यातली अत्यंत अडथळ्याची शर्यतच होती पण हळूहळू काळ बदलला अगदी शंभर टक्के नसला तरी बऱ्याच प्रमाणात, बऱ्याच क्षेत्रात, जवळजवळ सर्वच क्षेत्रात आजची स्त्री अग्रेसर होत असल्याचं चित्र दिसू लागलं आणि या परिणामाचा विचार करताना मनात येते की एखाद्या स्त्रीच्या जडणघडणीत आई-वडिलांचा जर डोळस, समंजस सहभाग आणि सामाजिक विचारसरणीला डावलण्याचे बळ असेल तर ती नक्कीच काहीतरी दैदिप्यमान असे करू शकते हे बऱ्याच अंशाने सिद्ध झालेले आहे. याच विचारांचे प्रतिबिंब डॉक्टर निशिकांत श्रोत्री यांच्या अवकाशाची सीमा या गीतात मला दिसलं. खरोखरच मन आनंदलं आणि या गीताचा रसास्वाद घ्यायलाच हवा असे अगदी मनापासून वाटले म्हणून हा लेखन प्रपंच.

☆ अवकाशाची सीमा  

तो: अवकाशाची सीमा कर्तुत्वाला

 खुडूनी आणी नभिच्या नक्षत्राला ध्रु

 *

ती : हो वीणा सरस्वतीची

 हो पद्मिनी पदन्यासाची

 सुरसमाधि गंधर्वाची

 प्रतिसाद कलेच्या दे आव्हानाला

 खुडूनी आणि नभिच्या नक्षत्राला१

 *

तो : खेळाडू मैदानाची

 मासोळी जलतरणाची

 पाकोळी अवकाशाची

 यश राहू दे सदा तुझ्या साथीला

 खुडूनी आणी नभिच्या नक्षत्राला २

 *

 तो: तव प्रज्ञा विनायकाची

 ती: ज्ञानाची विज्ञानाची

दोघे :वर्षा तुजवर आशीशाची

 तव तेजाचा मार्ग दीप जगताला

 खुडूनी आणी नभिच्या नक्षत्राला३

 – डॉ. निशिकांत श्रोत्री (निशिगंध)

हे गीत वाचल्यानंतर प्रथम जाणवतं ते हे एक प्रेरणा गीत आहे. या गीतात एका भाग्यशाली गुणी कन्येला आई-वडिलांकडून मिळणाऱ्या आशीर्वादाचे चित्र शब्दांकित केले आहे. आपल्या कन्येने चौफेर प्रगती करून तिचे स्वतःचे एक स्थान निर्माण करावे आणि जन्मदात्यांची मान उंच करावी अशी अपेक्षा त्यात मांडली आहे आणि त्यासाठी त्यांचं संपूर्ण पाठबळ तिला देत असताना भरभरून आशीर्वादही दिले आहेत हेच प्रथम दर्शनी गीत वाचताना लक्षात येतं. एका उदारमतवादी आईबापांचं आपल्या कन्येविषयीचं स्वप्न यात सुंदरपणे रेखाटलं आहे.

 हे एक निराळेच द्वंद्वगीत आहे आणि या गीतातील गायक माता आणि पिता आहेत.

  तो: अवकाशाची सीमा कर्तुत्वाला

 खुडुनि आणी नभिच्या नक्षत्राला।ध्रु  

या गीतातलं हे ध्रुवपदच पित्याने कन्येला दिलेल्या प्रेरणेचं आहे. मोठ्या अभिमानाने आणि विश्वासाने एक बाप मुलीला सांगत आहे, “ बेटा इतकं मोठं तुझं कर्तुत्व असूदे की त्यासाठी विशाल आकाशाच्या सीमाही तोकड्या पडाव्यात. अशी उंच भरारी घे की आकाशाचा चंद्र तुझ्या झोळीत येईल. ” या ध्रुवपदाच्या दोन ओळीतच त्या कन्येच्या सामर्थ्याविषयी पित्याने विश्वास दाखवला आहे आणि तिला उत्स्फूर्तपणे प्रोत्साहित आणि प्रेरित केले आहे.

“तुझ्या ध्येयासाठी SKY IS THE lIMIT असू दे” अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

खुडूनी आणि नभिच्या नक्षत्राला ही काव्यपंक्ती रूपकात्मक आहे. नभिचे नक्षत्र आणावे यात तिने उंच भरारी घेऊन अशक्य ते शक्य करून दाखवावे ही अपेक्षा बाळगलेली आहे.

कन्येच्या स्वप्नात भागीदार असलेली तिची माता ही हेच म्हणते,

 ती: हो वीणा सरस्वतीची

 हो पद्मिनी पदन्यासाची

 सूर समाधी गंधर्वाची

 प्रतिसाद कलेच्या दे आव्हानाला

 खुडूनी आणि नभिच्या नक्षत्राला१

जे कुठलं क्षेत्र तू निवडशील त्यात तू स्वतःला अत्त्युत्तम सिद्ध कर. त्या क्षेत्रातील शिखर गाठण्याचा प्रयत्न कर. संगीत क्षेत्रात तुला जर एखदे तंतुवाद्य शिकायचं असेल तर त्यात इतकं यश तुला मिळो की तुझ्या हाती वाजणारी वीणा ही जणू काही साक्षात सरस्वतीचीच वाटावी.

जर तुला नृत्यकलेत काही करून दाखवायचं असेल तर पदन्यासाचे शास्त्र इतकं आत्मसात कर की तुझं नृत्य पाहताना साक्षात पद्मिनीचेच दर्शन होईल आणि श्रेष्ठ गायिका बनायचं असेल तर सुरांची कठोर तपश्चर्या करून स्वर्गीय गंधर्वांची कला आत्मसात कर. तुझे गायन हे गंधर्वगायन ठरो. कुठल्याही कलेचं सर्वार्थाने, सर्वांगाने आव्हान तुला पेलता आलं पाहिजे.

आईने व्यक्त केलेलं हे कलेचं स्वप्न तर पित्याची आणखी काही निराळी इच्छा..

 तो: खेळाडू मैदानाची

 मासोळी जलतरणाची

 पाकोळी अवकाशाची

 यश राहू दे सदा तुझ्या साथीला

 खुडूनी आणि नभिच्या नक्षत्राला२

आपल्या उमलत्या कन्येला मोठ्या अभिमानाने हा पिता सांगत आहे, ” तुला जर क्रीडा क्षेत्रात तुझं स्थान निर्माण करायचं असेल तर मग मैदान गाजव. मैदानी खेळात असं प्राविण्य मिळव की सारं जग एक उत्तम खेळाडू म्हणून तुझं नाव घेईल. पाण्यात पोहायचं असेल तर मासोळी सारखं डोळ्यांचं पारणं फिटणारं पोहणं शिकून घे. इतकी गती, इतकं चापल्य त्यात असूदे! अंतराळात झेप घे आणि अवकाशालाच गवसणी घाल.

मी नेहमीच तुला यशासाठी शुभेच्छा देईन. जे वांछित आहे ते तुला मिळेलच. यश तुझ्या पदरात आपणहून येईल. फक्त डळमळू नकोस. असाध्य ते साध्य करण्याचा प्रयत्न कर. एक लक्ष्य ठेव. कधीही ध्येयाच्या मार्गावरून तुझं पाऊल मागे पडू नये. सदैव पुढे जात रहा.”

या ओळींमध्ये पाकोळी अवकाशाची ही शब्दरचना जरा विस्मित करते. खरं म्हटलं तर पाकोळी म्हणजे एक आकाशात भिरभिरणारं लहानसं पाखरू. पाकोळी हे पित्याने कन्येच्या “आज ती लहान असल्याचं” दर्शविण्यासाठी वापरलेला प्रतिकात्मक, रूपकात्मक शब्द असावा.

“बाळ आज तू माझं छोटंसं पाखरू आहेस पण तू जर अवकाशाचा वेग घ्यायचं ठरवलंस ना तर तुझ्या पंखातील ताकद नक्कीच वाढेल आणि आत्मनिर्भरतेने तू भविष्यात अंतराळात भरारी घेऊन चंद्र तार्‍यांशी दोस्ती करू शकशील हा विश्वास मला आहे. एक पाकोळी अवकाश ताब्यात घेऊ शकते हे जगाला दिसू दे. ”

पुढचा चरण अतिशय वाचनीय, आणि भावना उचंबळून टाकणारा आहे

तो: तव प्रज्ञा विनायकाची

 ज्ञानाची विज्ञानाची

दोघे: वर्षाव आशीशाची

 तव तेजाचा मार्गदीप जगताला

 खुडूनी आणी नभिच्या नक्षत्राला ३

पहिल्या ओळीत पित्याने कन्येला म्हटलं आहे, तव प्रज्ञा विनायकाची

“विनायक म्हणजेच गणेश म्हणजेच बुद्धीची देवता. मुली तू प्रज्ञावंत आहेस, बुद्धिमान आहेस, त्या गणेशाची तुझ्यावर कृपा आहे आणि त्याने बहाल केलेल्या बुद्धीचा तू योग्य रीतीने उपयोग करून घे. ”

या म्हणण्याला त्या मातेचेही अनुमोदन आहे आणि ती लगेच म्हणते,

ज्ञानाची विज्ञानाची ईश्वराने तुला ज्ञानी बनण्याची संधी प्राप्त करून दिली आहे. यथाशक्ती तू योग्य असे ज्ञानकण वेचून तुझ्या ज्ञानाची झोळी भरून घे. ”

 या इथे कवीने वापरलेल्या विज्ञानाची हा शब्द फार सूचक आहे. यात असा अर्थ अभिप्रेत आहे की, ” जगाने विज्ञानात प्रचंड प्रगती केली आहे. या विज्ञान युगात तू यत्किंचीतही मागे पडू नकोस. जे जे नवे ते ते स्वबुद्धीने आत्मसात कर. रचनात्मक प्रगत विज्ञानाचा सकारात्मक पाठपुरावा करून तुझ्या हातून काहीतरी अलौकिक घडू दे! ”

मातापित्यांच्या स्वप्नाचे सूर एकमेकात मिसळतात आणि दोघेही एकत्रपणे म्हणतात,

 वर्षाव तुजवर आशीशाचा

 तव तेजाचा मार्गदीप जगताला

 खुडूनी आणि नभिच्या नक्षत्राला..

आम्ही दोघेही तुझ्यावर मनापासून आशीर्वादांचा वर्षाव करतोय आणि विश्वास व्यक्त करतो की जिथे कुठे जाशील, जे कुठले क्षेत्र निवडशील त्यात तुला झळाळते लखलखीत यश लाभो आणि तुझ्या यशोतेजाने तू तुझ्या मागून येणाऱ्यांना प्रकाश दे. त्यांचाही मार्ग उजळ. जगासाठी एक आदर्श उदाहरण तुझ्या रूपाने ठेव. पुढच्या पिढीसाठी तू दीपस्तंभ हो आणि आकाशातील चंद्र तारे वेचण्याचं तुझं धडाडीचं स्वप्न पूर्ण होऊ दे. ”

अशा रीतीने हे संपूर्ण गीत उलगडताना एका सुंदर प्रेरणागीताचा अनुभव मनाला प्रसन्न करतो. या गीतात आई-वडिलांनी कन्येला दिलेला प्रेमळ आणि प्रांजळ असा मौलिक आशीर्वाद आहे.

॥शुभास्ते पंथान: संतु॥ याच भावाचा तो आशीर्वाद आहे. आपल्या कन्येसाठी कला, क्रीडा, साहित्य, संगीत, विज्ञान, ज्ञानाची सर्व दालने त्यांनी खुली ठेवली आहेत. कसलाही दबाव तिच्यावर नाही. एका कळीतून सुंदर फुल पूर्ण उमलू दे हीच भावना.

डॉ. निशिकांत श्रोत्री एक महान कवी तर आहेतच पण आजपर्यंत त्यांच्या ज्या अनेक कविता मी वाचलेल्या आहेत त्यातून त्यांचं स्त्रीवादीपण प्रकर्षाने झिरपलेलं आहे. कुठलीही कविता असूदेत पण त्यांच्या शब्दातून मनापासून स्त्रीचा सन्मान करणारेच भाव प्रकट होत आले आहेत. अगदी त्यांच्या शृंगारिक कवितेत सुद्धा त्यांनी कधीही कोणत्याही प्रकारे विकृतपणे स्त्रीचे चित्र कधीही चितारलेलं मला आठवत नाही. कदाचित माझ्याकडून हे थोडं विषयांतर होत असेल पण कवीच्या मनाचे अंतरंग किती निर्मळ असू शकतात हे आजच्या त्यांच्या अवकाशाची सीमा या गीताविषयी लिहिताना मला जाणवलं आणि ते अधोरेखित करावसं वाटलं कारण एखादं काव्य सुंदर का वाटतं तर तिथे कवीचं सुंदर मन असतं म्हणूनच.

अवकाशाची सीमा या गीतातील साधीच, फारसे क्लिष्ट अलंकार, छंद, वृत्त नसलेली पण प्रेमळ आई-वडिलांचे मुलीबद्दलच्या भविष्याचे स्वप्नरंजन करणारी प्रेमळ, वात्सल्यपूर्ण आणि प्रेरणादायी शब्दरचना वाचकाच्या मनाला थेट भिडते. फक्त इतकच नसून हे गीत समाज विचारसरणीला शंभर पावले पुढे नेतं म्हणून तेही अधिक महत्त्वाचं वाटतं. या गीतातला वात्सल्य रस आणि माता पित्यांच्या कन्येविषयीच्या उच्च भावना माझ्यासारख्या स्त्रीवाचकाला आणि दोन कन्येच्या मातेला नक्कीच भारावून टाकतात. या गीताचं हेच परमयश आहे असंच मी मानते.

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

radhikabhandarkar@yahoo.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ भेट… कवी : मा. दीपक पटेकर. (दीपी) ☆ रसग्रहण – राधिका भांडारकर ☆

राधिका भांडारकर

? काव्यानंद ?

☆ भेट… कवी : मा. दीपक पटेकर. (दीपी) ☆ रसग्रहण – राधिका भांडारकर ☆

एखादं नातं विरून जातं पण त्या नात्यातले अनुभवलेले काही हळुवार कोमल प्रीतीचे क्षण मात्र नकळत सोबत राहतात. प्रेमाची परिणीती जरी निर्णायक झाली नसली तरी भावनांचा अविष्कार पुसत नाही. रोजच्या जीवनचक्रात हे सारं गरगरत असतंच पण अचानक असं काहीतरी घडतं की काळ, परिस्थिती, मागे घडलेलं सारं काही विसरून जायला होतं आणि मन पुन्हा त्या मधुर क्षणांच्या आठवणीत रमतं. हरवलेलं गवसू लागतं.

“बकुळीची फुले” या कवी दीपक पटेकर (दीपी) यांच्या काव्यसंग्रहातील भेट ही कविता वाचल्यानंतर मनात हेच विचार झळकून गेले. अतिशय भावूक आणि हळुवार कविता! ती वाचली आणि तिचा रसास्वाद घ्यावासा वाटला. प्रथम कविता वाचूया.

 भेट ☆

 भेट अचानक होते तेव्हा

 जुन्या आठवा डोळे भरती

 वरवर शांती परि अंतरी

 विचारचक्रे गरगर फिरती …

भेट अचानक होते तेव्हा

 मुके शब्द अन् नयन बोलती

 नसे वाच्यता फक्त शांतता

 नयनामध्ये तिज साठवती..

 *

 भेट अचानक होते तेव्हा

 थरथर थरथर अधर कांपती

श्वासामध्ये वाढुनि अंतर

 हृदयामधले ठोके चुकती..

 *

भेट अचानक होते तेव्हा

 जुने वाद अन भांडण स्मरती

 रुसवे फुगवे हास्यात विरुनि

 हातामध्ये हातच धरती …

 *

भेट अचानक होते तेव्हा

स्पर्शामधुनी ओढ जाणती

 मनपटलावर होउनि हलचल

येते लाली गालांवरती..

 *

 भेट अचानक होते तेव्हा

 नयन इशारे नयना कळती

 अधरांशी अधरांनी बोलुनी

 मिटून डोळे मिठास घेती..

 – दीपक पटेकर

 या कवितेत एका ब्रेकअपची कहाणी आहे.

 भेट अचानक होते तेव्हा

 जुन्या आठवा डोळे भरती

बरोबर शांती परि अंतरी

 विचारचक्रे गरगर फिरती… 

सगळं काही संपलेलं असताना, ध्यानीमनी नसताना अचानक ती भेटते आणि जुन्या मधुर आठवणी जाग्या होतात. डोळे पाणावतात. काळाने सगळं बदललेलं असतं. दोघांचीही जीवने आता वेगवेगळ्या दिशेला पांगलेली असतात. त्यामुळे असे एकाएकी पुन्हा भेटल्यानंतर त्याच्याकडून कुठलीही उत्तेजित प्रतिक्रिया जरी परिस्थितीचे भान ठेवून झाली नसली तरी अंतरात मात्र असंख्य विचारचक्रे फिरू लागतात. ती कशी असेल या क्षणी?

तिच्या मनात नक्की कोणते भाव असतील?

माझ्या मनातल्या भावांशी त्यांचे साम्य असेल का? वगैरे शंका त्याच्या मनात स्वाभाविकपणे डोकावतात.

भेट अचानक होते तेव्हा

मुके शब्द अन् नयन बोलती

नसे वाच्यता फक्त शांतता

नयनामध्ये तिज साठवती..

या अनपेक्षित भेटीत शब्द, वाचा मूक झाली असली तरी नजरेच्या भाषेतून अर्थ झिरपत आहेत. तो फक्त त्या क्षणी तिचे रूप आपल्या डोळ्यात साठवून ठेवत आहे.

भेट अचानक होते

थरथर थरथर अधर कांपती

श्वासामध्ये वाढुनि अंतर

 हृदयामधले ठोके चुकती..

शृंगार, प्रीतभावना, प्रणयातुरता या अशा काही हळुवार कोमल भावना आहेत की त्या जेव्हा अंत:प्रवाहात जाणवतात तेव्हा त्याची स्पंदनं देहावर उमटतात. त्याचं कवीने नेमकं वर्णन या कडव्यात केलेलं आहे. तिला पाहिलं आणि नकळत ओष्ठद्वयांचं कंपन जाणवलं. श्वास जणू काही थांबला आणि हृदयातले ठोके वाजू लागले. धडधड जाणवू लागली. हरवलेल्या प्रेमाच्या आशावादामुळे होणारी देह स्थिती आणि त्याचा अनुभव असा निराळाच असावा, हे कवीने अत्यंत समर्थ शब्दात वेचले आहे.

 भेट अचानक होते तेव्हा

 जुने वाद अन भांडण स्मरती

 रुसवे फुगवे हास्यात विरूनी

हातामध्ये हातच धरती…

कसं असतं ना? प्रेमामध्ये वाद असतात भांडण असतात, रुसवे फुगवे सारं काही असतं. नात्यात अंतर पडतं, दरी निर्माण होते. पण ते तेवढ्यापुरतंच असतं. रागाच्या भरात तुटफुट झालेली असते पण पुन्हा अचानक भेट घडल्यानंतर मात्र “कसं चुकलं आपलं! ” हे जाणवून हास्य फुलतं आणि एकमेकांचं नातं किती घट्ट आहे याची साक्ष हातात हात धरल्यावर मिळते.

 भेट अचानक होते तेव्हा

 स्पर्शामधुनी ओढ जाणती

मनपटलावर होउनि हलचल

 येते लाली गालावरती…

काळाबरोबर जे विसरलं गेलं असं वाटत असतानाच दोघांची अचानक भेट होते आणि जाणवतं आपल्यात अजून सारे काही तसेच आहे. स्पर्शातली ओढ आजही कायम आहे आणि मनावर लहरलेल्या या तरंगांनी पुन्हा शरीरात एक लाट उसळते. जे आतापर्यंत दडपलं होतं ते जागू लागतं आणि त्या भावनेने दोघेही तितकेच हरखून जातात. क्षणात जे त्याला वाटत होतं ते तिलाही वाटतंय याची साक्ष तिच्या गालावर चढलेली लाली देते.

 भेट अचानक होते तेव्हा

नयन इशारे नयना कळती

 अधरांशी अधरांनी बोलुनि

 मिटून डोळे मिठास घेती..

कवितेतलं हे शेवटचं कडवं म्हणजे भावनांनी गाठलेला शिखरबिंदू आहे. याप्रसंगात शब्दांचं काही कामच उरत नाही. प्रीतीची भाषा ही केवळ नयनांतून व्यक्त होते. इथे शब्द बोलत नाहीत नजरा बोलतात. नजरेचे इशारेच पुरे असतात मग सारे बंध सुटतात, नियम अटी नाहीशा होतात. या क्षणी खरं फक्त एकच असतं ते म्हणजे प्रीतीची ओढ, स्पर्शाची आतुरता, पुन्हा एकदा एकमेकांनी दिलेली देहाची हाक आणि अर्थात मग बेभानपणे ओठावर ओठ टेकतात आणि डोळ्यांची पाखरं अलगद मिटतात. त्यानंतरचा अनामिक आनंद आणि गोडवा मिटलेल्या देहात उसळतो.

तुटलेलं एक नातं पुन्हा जुळतं.

दीपक पटेकरांची ही कविता वाचल्यानंतर फक्त दोनच शब्द ओठावर येतात, ”निव्वळ अप्रतिम!”

ही संपूर्ण कविता पादाकुलक वृत्तात रचलेली आहे. अतिशय सहज- सुलभ, लयबद्ध शब्दरचना. संपूर्ण काव्यभाव वाचकाच्या हृदयापर्यंत पोहोचवणारी रसमय शब्दशैली. चोवीस ओळींच्या या कवितेत ओळींपलिकडचे कित्येक न लिहिलेले भावशब्दही वाचक वाचतो आणि एका वेगळ्याच भावविश्वात रमून जातो.

या कवितेचं वैशिष्ट्य असं की “भेट अचानक होते तेव्हा” ही या काव्याची मध्यवर्ती टॅगलाईन आहे आणि प्रत्येक कडव्यात या भेटीमुळे निर्माण झालेला अलवार भावरंग टिपण्यात कवीची संवेदनशीलता आणि शब्दसामर्थ्य जाणवते. दोन प्रेमिकांची ही भेट जशीच्या तशी त्याच गोडव्याने आणि भावनाविष्काराने डोळ्यासमोर उभी राहते. हा स्वभावोक्ती अलंकार कवीने फार सुंदर साधला आहे.

शृंगार रसात, प्रेमभावात भिजलेले हे काव्य वाचताना कुठेही अश्लीलता जाणवत नाही.

झाडावर फुल उमलावं आणि भ्रमराने पाकळ्यांवर हळूच उतरावे इतका अलगद शृंगार या काव्यात आहे. विरहानंतरच्या या शृंगारात पुनर्मिलनाची उत्कटता आहे. “कामोत्तेजिता” ही नैसर्गिक भावना आहे आणि त्याचं वर्णन जर संयतपणे केलं तर ते विकृत न वाटता सौंदर्यशाली वाटतं आणि शृंगारिक काव्य वाचताना हा अनुभव येणं हे शब्दांचे सामर्थ्य आणि कवितेचे यश अधोरेखित करतं.

दीपीजी, आपलं मनापासून अभिनंदन आणि आपला हा काव्यप्रवास सातत्याने होत राहो हीच शुभेच्छा!

© राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

radhikabhandarkar@yahoo.com

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ विसाव्याचे क्षण… – सुरेखा चिखलकर ☆ रसग्रहण… श्री उदय माने ☆ प्रस्तुती – सुरेखा चिखलकर ☆

सुरेखा चिखलकर

? काव्यानंद ?

☆ विसाव्याचे क्षण… – सुरेखा चिखलकर ☆ रसग्रहण… श्री उदय माने ☆ प्रस्तुती – सुरेखा चिखलकर ☆  

☆ विसाव्याचे क्षण… – सुरेखा चिखलकर ☆

आता मिळाले विसाव्याचे क्षण

आठवणी बनल्या सावल्या,

भावनेचा पसारा सावरून

परतीच्या मार्गावर चालल्या..

नात्यांची आता कुठेच

दुःखाला ओढ नाही,

कोरड्या आसवांना

वाहण्याची जोड नाही..

 *

काळजाच्या कपारीत

आठवांचे रोज झिरपणे,

वाट अंधारल्यावर

मौन आता विसरणे…

 *

धूसर पाऊलवाट जणू

न्याहाळते उरलेली वाट,

मनाच्या कातळावर

झिरपू लागतो काठ…

 *

विस्कटलेल्या पसाऱ्यांमध्ये

 वेचावे आता थोडे क्षण

आयुष्याचा सडा अंगणी

देह निर्माल्य राहो कण…

सुरेखा चिखलकर

8806913315

समीक्षण – ‘विसाव्याचे क्षण‘ – एक चिंतन

ही कविता आयुष्याच्या त्या वळणावर उभी आहे जिथे धावपळ थांबली आहे आणि आठवणींचा मागोवा घेण्याची वेळ आली आहे. कवयित्रीने ‘विसावा’ या संकल्पनेला केवळ विश्रांती म्हणून न पाहता, आयुष्यातील संघर्षांनंतरची एक ‘स्वस्थ स्थिती’ म्हणून मांडले आहे. ‘सावल्या बनलेल्या आठवणी’ हे रूपक अतिशय सुंदर आहे. ज्या आठवणींनी एकेकाळी दुखावले होते, त्या आता केवळ शांत सोबती बनल्या आहेत. कवितेची भाषा साधी, प्रवाही आणि मनात घर करणारी आहे. ​मानवी आयुष्यात आपण कितीतरी भावनांचे ओझे वाहतो. ते ओझे आता ‘परतीच्या मार्गावर’ कमी होत चालल्याचे कवयित्रीने मांडले आहे. ‘नात्यांची दुःखाला ओढ नाही’ ही ओळ खूप सखोल आहे. आयुष्याच्या या टप्प्यावर अपेक्षा संपतात आणि त्यामुळे दुःखाची तीव्रताही कमी होते. ‘मौन विसरणे’ किंवा ‘मनाच्या कातळावर झिरपणे’ यांसारख्या प्रतिमा मानवी मनातील खोलवर असलेल्या शांततेचे दर्शन घडवतात.

कवयित्रीने दुःखाला कुरवाळण्याऐवजी, त्याला सावरून पुढे जाण्याची जी वृत्ती दाखवली आहे, ती खऱ्या अर्थाने ‘विसाव्या’ची प्रचिती देते.

‘विसाव्याचे क्षण’ ही कविता म्हणजे जीवनाचा एक परिपक्व आढावा आहे. धावपळीच्या या युगात, जिथे प्रत्येकजण काहीतर मिळवण्यासाठी धडपडत आहे, तिथे कवयित्रीने ‘काहीही न हवे असण्याची’ स्थिती किती शांत असू शकते, याचे सुंदर वर्णन केले आहे. ही कविता वाचकाला अंतर्मुख करते आणि आपल्याच आयुष्यातील ‘विसाव्याच्या क्षणांचा’ शोध घ्यायला प्रवृत्त करते.

​थोडक्यात सांगायचे तर ही कविता केवळ शब्दांची मांडणी नसून ती जगण्याचा एक शांत आणि समाधानी दृष्टिकोन देणारी एक कलाकृती आहे.

विस्कटलेल्या पसाऱ्यांमध्ये

वेचावे आता थोडे क्षण,

आयुष्याचा सडा अंगणी

देह निर्माल्य राहो कण..

​हे चरण कवितेचा गाभा आहे.

‘विस्कटलेला पसारा’ हे शब्द आपल्या आयुष्यातील सुख-दुःख, धावपळ, अपूर्ण राहिलेल्या इच्छा आणि जुन्या आठवणींचे प्रतीक आहेत. या विस्कटलेल्या आयुष्यातून आता केवळ ‘क्षण’ वेचायचे आहेत, म्हणजेच आता कसलीही मोठी ध्येये न ठेवता, वर्तमानातील शांततेचा आनंद घ्यायचा आहे, असा अर्थ यातून निघतो. ‘देह निर्माल्य राहो कण’ ही ओळ अतिशय प्रभावी आहे. मंदिरात वाहिलेली फुले (निर्माल्य) जशी देवाला अर्पण झाल्यावर आपले अस्तित्व विसरतात, तशीच इच्छा कवयित्रीने व्यक्त केली आहे. आयुष्यभर कष्ट सोसलेला देह आता थकल्यानंतर, तो निसर्गाच्या किंवा ईश्वरी चरणी शांतपणे समर्पित व्हावा, ही त्यातील गांभीर्य आणि पावित्र्य दर्शवते.

आयुष्याच्या शेवटी ‘सडा अंगणी’ असावा, म्हणजे सर्व काही प्रसन्न आणि नीटनेटके असावे, ही ओळ मनातील विचारांची स्पष्टता दर्शवते. गोंधळ, कलह किंवा अपेक्षांचे ओझे आता उरलेले नाही. आता देहाचे कण कण जरी निसर्गाला परत द्यावे लागले, तरी त्यात एक प्रकारचे समाधान आणि तृप्ती आहे.

हे चरण आयुष्याच्या अंतिम सत्याचा अत्यंत हळुवारपणे स्वीकार करते. भीती न बाळगता, एक प्रकारचे ‘निर्लेप’ होऊन जीवनाच्या प्रवासाची सांगता करणे, हे या ओळींचे मुख्य सौंदर्य आहे.

​थोडक्यात हे अंतिम चरण कवितेला एका आध्यात्मिक उंचीवर नेऊन ठेवते. “जे काही राहिले आहे, ते आता आनंदाने उपभोगावे आणि जाताना मागे फक्त सकारात्मकतेचा सुगंध सोडावा, ” हा संदेश या चरणातून मिळतो. हे शब्द केवळ मृत्यूचे वर्णन करत नाहीत, तर ते ‘जगावे कसे’ आणि ‘जावे कसे’, याचे एक सुंदर मार्गदर्शन करतात.

रसग्रहण – श्री उदय माने

काव्यानंद.. प्रस्तुती सुरेखा चिखलकर

8806913315

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ कळी फूल होताच… – राधा गर्दे ☆ रसग्रहण… सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆

अरुणा मुल्हेरकर

? काव्यानंद ?

☆ कळी फूल होताच… – राधा गर्दे ☆ रसग्रहण… अरुणा मुल्हेरकर ☆

☆ कळी फूल होताच… – राधा गर्दे ☆

(भावगीत)

कळी फूल होताच धुंदावली

वसंतासवे गर्विता जाहली॥ध्रु॥

*

सुगंधात न्हाऊन सुस्नात ही

दवाची गळा माळ घालोन ही

कशी ऐट दावीत गंधाळली

वसंतासवे, गर्विता जाहली ॥१॥

*

अली चुंबिता रोखुनी पाहते

तरी मुग्ध होऊनिया लाजते

मनाने अलिशी असे बांधली

वसंतासवे गर्विता जाहली ॥२॥

*

मिटे पाकळ्यांना हळू रुपसी

खुले रूप लावण्य हे राजसी

जणू मेनकारूप ही ल्यायली

वसंतासवे गर्विता जाहली॥३॥

*

पहाटेस निहार सुस्तावता

चकाकून देहावरी थांबता

शहारुन ती बावरू लागली

वसंतासवे, गर्विता जाहली ॥४॥

कवयित्री सौ. राधा गर्दे यांचे हे भावगीत वाचले आणि ताबडतोब त्यांच्या परवानगीने मी रसग्रहण लिहायला बसले.

सौ. राधा गर्दे या संस्कृत पंडिता आहेत. त्यांच्या काव्यातून अनेकदा संस्कृत शब्दांचा मुक्त संचार आढळतो. खरं सांगायचं तर संस्कृत ही मराठी भाषेची जननी आहे, आणि जेव्हा आपण भारदस्त भाषा वापरतो तेव्हा या संस्कृत शब्दांच्या पखरणीमुळे भाषेचे सौंदर्य वाढते. राधाताईंच्या या कवितेतून नेमके हेच चित्र दृश्यरूप झाल्याचे आढळते.

 कळी फुल होताच धुंदावली

 वसंतासवे गर्विता जाहली॥ध्रु॥

ध्रुवपदाच्या या दोन ओळी वाचता क्षणीच आपल्या नजरेसमोर चित्र येते ते वसंत ऋतुतल्या बहराचे. जिकडे तिकडे जाई, जुई, मोगरा, चमेली, सोनचाफा ही सुगंधित फुले फुललेली असतात आणि वातावरणात एक प्रकारची प्रसन्नता दिसून येते. या फुलातील एका कळीला तिच्या सौंदर्याचा गर्व होतो अशी कवयित्रीची कल्पना आहे.

 सुगंधात न्हाऊन सुस्नात ही

 दवाची गळा माळ घालोन ही

कशी ऐट दावीत गंधाळली

वसंतासवे…

हे कळीचे नुकतेच उमलून आलेले फुल त्याच्यावरील दवबिंदूंच्या वर्षावाने जणू काही न्हाऊन निघाले आहे आणि मोठ्या रुबाबात ते त्याचा परिमळ सर्वत्र पसरवत आहे.

 अली चुंबिता रोखुनी पाहते

 तरी मुग्ध होऊनिया लाजते

 मनाने अलीशी असे बांधली

 वसंतासवे…

या दुसऱ्या अंतर्‍यात त्या फुलावर लुब्ध होऊन

अली म्हणजे भ्रमर त्याचे चुंबन घेत आहे आणि ते फुल अतिशय मुग्ध व लज्जीत झाले आहे. त्या फुलाच्या मनात या मधुपा विषयी गोड प्रेम भाव निर्माण झाला आहे.

 मिटे पाकळ्यांना हळू रुपसी

 खुले रूप लावण्य हे राजसी

 जणू मेनका रूप ही ल्यायली

 वसंतासवे…

राधाताई या तिसऱ्या कडव्यात काय सांगत आहेत? तर लाजेने ते फुल आपल्या पाकळ्या अलगदपणे मिटून घेत आहे आणि त्यामुळे त्याचे राजस रूप अधिकच खुलले आहे.

 पहाटेस निहार सुस्तावता

 चकाकून देहावरी थांबता

 शहारुन ती बावरू लागली

 वसंतासवे, गर्विता जाहली.

या शेवटच्या अंतऱ्यात त्या फुलाची अवस्था राधाताईंनी फार सुंदर शब्दात वर्णन केली आहे. पहाटेच्या वेळी जशी काही दाट धु क्याची शाल फुलाच्या सर्वांगावर घातली आहे, पहाटेच्या गारव्यामुळे ते फुल जसे काही शहारून गेले आहे.

हा झाला या कवितेचा शब्दशः अर्थ. पण जसजशी ही कविता वाचत जावी तसतसे लक्षात येते की हे एका कळीचे फुलात झालेल्या रूपांतराचे नुसते प्रासादिक वर्णन नसून ही संपूर्ण कविता म्हणजे एक रूपक आहे.

एका मुग्ध बालिकेने नुकतेच तारुण्यात पदार्पण केले आहे. वसंत ऋतु म्हणजे त्या वयात आलेल्या मुलीच्या मनातील मधुर सुगंधित असे भाव आहेत. तिच्या सौंदर्याचा तिला थोडा गर्व झाला आहे, त्याची ऐट दाखवत ती रुबाबात वावरते आहे. तिचे चुंबन घेणारा भ्रमर हा दुसरा तिसरा कोणी नसून तिचा सखा आहे. त्याच्यासोबत ती मनाने जोडली गेली आहे. त्याच्या स्पर्शाने तिचे रोमरोम शहाले आहे आणि स्त्री सुलभलज्जेने तिचे सौंदर्य इतके खुलले आहे की जणू काही स्वर्गातली अप्सरा मेनकाच पृथ्वीतलावर अवतरली आहे. पहाटेचे धुके म्हणजे प्रियकराच्या सहवासातील प्रेम आहे. त्या प्रेमाच्या धुंदीत तिचे मन बावरून गेले आहे.

चेतनगुणोक्ती अलंकाराने सजलेली राधाताईंची ही कविता प्रत्येक वाचकाच्या मनाचा ठाव घेणारे एक सुंदर भावगीत आहे.

भुजंगीवृत्तात ही कविता राधाताईंनी अगदी सहज लिहिल्यासारखी वाटते. अली, निहार, राजसी इत्यादी शब्द कवितेत कसे अगदी चपखल बसले आहेत. रूपसी राजसी, सुस्तावता थांबता वगैरे स्वरयमकेही सहज वाटतात. कुठेही कसलीही ओढाताण नाही. वृत्तबद्ध कविता लिहिणे ही गोष्ट तशी सहज करता येण्यासारखी नाही, कारण कवीला सुचलेला शब्द वृत्ताच्या लगावलीत किंवा मात्रेत बसतोच असे नाही. अशावेळी कवीच्या प्रतिभेचा कस लागतो. राधाताई शब्दांच्या या झटापटीतून अगदी अलगद बाहेर पडल्याचे दिसून येते.

अशाच लिहित्या रहा. पुढील वाटचालीसाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा!

© अरुणा मुल्हेरकर 

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ औदुंबर… बालकवी ☆ रसग्रहण – राधिका भांडारकर ☆

राधिका भांडारकर

? काव्यानंद ?

☆ औदुंबर… बालकवी ☆ रसग्रहण – राधिका भांडारकर ☆

☆ औदुंबर ☆

ऎल तटावर पैल तटावर हिरवाळी घेऊन

निळासांवळा झरा वाहतो बेटाबेटातुन.

 *

चार घरांचे गांव चिमुकले पैल टेकडीकडे

शेतमळ्यांची दाट लागली हिरवी गरदी पुढे.

 *

पायवाट पांढरी तयांतुनि अडवीतिडवी पडे

हिरव्या कुरणामधुनि चालली काळ्या डोहाकडे.

 *

झांकळुनी जळ गोड काळिमा पसरी लाटांवर

पाय टाकुनी जळांत बसला असला औदुंबर.

– बालकवी 

बालकवींच्या “औदुंबर” कवितेचे रसग्रहण.

मराठी साहित्यात निसर्गाचे अत्यंत कोमल, चित्रमय आणि भावस्पर्शी वर्णन करणाऱ्या कवितांमध्ये “औदुंबर” या कवितेचे स्थान विशेष आहे. बालकवींनी अवघ्या काही ओळींत एक जिवंत निसर्गचित्र वाचकांच्या डोळ्यांसमोर उभे केले आहे. ही कविता वाचताना आपण एखाद्या शांत नदीकाठी उभे आहोत आणि त्या दृश्याकडे तल्लीन होऊन पाहत आहोत, असा अनुभव येतो.

कवितेच्या सुरुवातीलाच कवी म्हणतात की झऱ्याच्या दोन्ही तीरांवर हिरवीगार वनराई पसरलेली आहे. निळसर पाणी बेटाबेटांतून संथपणे वाहत आहे. या वर्णनामुळे मनात शांत, प्रसन्न आणि रमणीय वातावरण निर्माण होते. पुढे पाण्यातील काळसर डोह, त्यातील पांढऱ्या पायवाटा, हिरव्या कुरणांवर चरणारी जनावरे अशा तपशीलांमुळे दृश्य अधिक सजीव बनते.

बालकवींची एक मोठी ताकद म्हणजे शब्दांतून चित्र निर्माण करण्याची क्षमता. हिरवे, निळे, काळे, पांढरे अशा रंगछटांचा अत्यंत प्रभावी वापर त्यांनी केला आहे. त्यामुळे कविता केवळ वाचली जात नाही, तर ती डोळ्यांसमोर उभी राहते.

मात्र या कवितेचे खरे सौंदर्य शेवटच्या ओळीत दडलेले आहे—

“पाय टाकुनी जळात बसला असला औदुंबर.”

येथे औदुंबर वृक्षाचे मानवीकरण केले आहे. तो एखाद्या समाधानी, चिंतनशील ऋषीसारखा पाण्यात पाय सोडून शांत बसला आहे, असे वाटते.ही फक्त झाडाची प्रतिमा नाही. आयुष्याच्या धावपळीतून निवृत्त झालेला, जगाकडे शांत नजरेने पाहणारा एखादा ज्ञानी मनुष्यही त्या औदुंबरात दिसतो. सभोवताली हिरवळ, पाणी, पशुपक्षी, जीवनाची हालचाल सुरू आहे; पण औदुंबर मात्र निर्विकार, समाधानी  स्थिर आहे.ही प्रतिमा केवळ निसर्गचित्र राहत नाही, तर ती जीवनदृष्टी बनते. जगातील गोंधळ, धावपळ आणि अस्थिरतेच्या मध्यभागी स्थिर, शांत आणि समाधानी राहण्याचा संदेश या प्रतिमेतून सूचित होतो.

या कवितेचा स्थायीभाव शांत रस आहे. निसर्गाच्या सान्निध्यात मिळणारी प्रसन्नता, निवांतपणा आणि अंतर्मुखता यांचा अनुभव कविता देते. अलंकारांच्या दृष्टीने मानवीकरण, अनुप्रास आणि चित्रमयता यांचा सुंदर उपयोग आढळतो.

“औदुंबर” ही केवळ एका वृक्षाची किंवा नदीकाठची कविता नाही. ती निसर्गाशी एकरूप होण्याची, क्षणभर थांबून जीवनाकडे शांत नजरेने पाहण्याची प्रेरणा देते. म्हणूनच ही कविता आजही वाचकांच्या मनात तितकीच ताजी आणि जिवंत राहिली आहे.

थोडक्यात, “औदुंबर” ही निसर्गसौंदर्य, शांतता, स्थैर्य आणि समाधानी जीवनदृष्टी यांचे अत्यंत प्रभावी कलात्मक दर्शन घडवणारी बालकवींची अजरामर कविता आहे.

© राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

radhikabhandarkar@yahoo.com

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ “बुद्धि दे रघुनायका ..” – कवी : श्री समर्थ रामदास ☆ रसग्रहण –  श्री दिवाकर बुरसे ☆

श्री दिवाकर बुरसे

? काव्यानंद ?

☆ “बुद्धि दे रघुनायका ..” – कवी : श्री समर्थ रामदास ☆ रसग्रहण –  श्री दिवाकर बुरसे ☆

काव्यानंद

समर्थांची मूळ कविता…

☆ बुद्धि दे रघुनायका ☆

युक्ति नाही बुद्धि नाही। विद्या नाही विवंचिता॥

नेणता भक्त मी तुझा। बुद्धी दे रघुनायका॥१॥

 *

मन हे आवरेना की। वासना वावडे सदा॥

कल्पना धावते सैरा। बुद्धी दे रघुनायका॥२॥

 *

बोलता चालता येना। कार्यभाग कळेचिना॥

बहुत पीडिलो लोकी। बुद्धी दे रघुनायका॥३॥

 *

तुझा मी टोणपा झालो। कष्टलो बहुतापरी॥

सौख्य ते पाहता येत नाही। बुद्धी दे रघुनायका॥४॥

 *

नेटके लिहीता येना। वाचिता चुकतो सदा॥

अर्थ तो सांगता येना। बुद्धी दे रघुनायका॥५॥

 *

प्रसंग वेळ तर्केना। सुचेना दीर्घ सूचना॥

मैत्रिकी राखता येना। बुद्धी दे रघुनायका॥६॥

 *

संसारी श्लाघ्यता नाही। सर्वहि लोक हासती॥

वीसरु पडतो पोटी। बुद्धी दे रघुनायका॥७॥

 *

चित्त दुश्चित होता हे। ताळतंत्र कळेचिना॥

आळसू लागला पाठी। बुद्धी दे रघुनायका॥८॥

 *

कायावाचामनोभावे। तुझा मी म्हणवितसे॥

हे लाज तुजला माझी। बुद्धी दे रघुनायका॥९॥

 *

आशा हे लागली मोठी। दयाळुवा दया करी॥

आणीक नलगे काही। बुद्धी दे रघुनायका॥१०॥

सद्गुरु श्री समर्थ रामदासस्वामी

 बुद्धी दे रघुनायका

साधक समर्थांच्या अंतःकरणातील आर्त स्वर

🪷

प्रस्तावना

दुर्गुणांशी झुंज, असहाय्यतेची स्विकृती आणि शरणागतीतील तेजस्वी साधना.

समर्थ रामदासांच्या साधनाकाळात उमटलेले हे आर्त उद्गार म्हणजे एका संताच्या अंतःकरणातील निखळ प्रामाणिकपणा. “युक्ति नाही बुद्धि नाही” अशी स्वतःच्या अपूर्णतेची निर्भीड आणि प्रांजळ स्विकृती देत ते ज्या स्वरात रामरायाला साद घालतात, तो स्वर केवळ भक्तीचा नाही, तर आत्मपरिक्षणाचा, आत्मनिवेदनाचा आणि अखेरीस संपूर्ण शरणागतीचा आहे!

ही कविता म्हणजे एका साधकाच्या अंतर्मनातील वादळाचे काव्यमय चित्रण. मनाची चंचलता, वासनांची चक्रावर्ते, विवेकाचा अभाव, सामाजिक अपयश, आत्मविश्वासाची ढासळलेली भिंत— या सर्वांचा अत्यंत हळवा, तरीही धैर्यवान स्वीकार येथे दिसतो. समर्थांचा हा आर्त स्वर त्यांना अधिक महान करतो; कारण येथे संतत्वाचा गर्व नाही, तर साधकाची नम्रता आहे.

आत्मस्वीकाराचा निर्भय प्रकाश

“युक्ति नाही बुद्धि नाही। विद्या नाही विवंचिता॥”

या आरंभीच्याच ओळीत समर्थ जणू आपल्या मनाच्या दर्पणात स्वतःकडे पाहतात. आत्मप्रौढीचा लवलेश नाही. स्वतःच्या उणिवांची जाणीव हेच खरे साधनाचे पहिले पाऊल.

साधक जेव्हा आपल्या दुर्गुणांना ओळखतो, तेव्हा तो त्यांच्यापासून सुटण्याच्या मार्गावर निघतो. समर्थांची ही स्विकृती म्हणजे आत्मशुद्धीचा आरंभबिंदू. येथे संतत्वाचा दिव्य तेजोमय मुकुट नाही, तर साधकाची विवंचना आहे—एक जिवंत, धडधडणारी, प्रामाणिक विवंचना.

मनाचा उच्छाद आणि वासनांची वावटळ

“मन हे आवरेना की। वासना वावडे सदा॥ कल्पना धावते सैरा…”

मनाची ही चंचलता म्हणजेच साधनेतील सर्वांत मोठा अडसर. समर्थांनी या अवस्थेचे केलेले वर्णन अत्यंत जिवंत आहे. कल्पना सैरभैर धावते, वासना विवेकाला झाकोळून टाकते, आणि मनावरचे नियंत्रण सुटते.

ही अवस्था केवळ समर्थांची नाही, तर प्रत्येक साधकाची आहे. म्हणूनच ही कविता सार्वकालिक ठरते. समर्थांचे मनही आपल्यासारखेच चंचल आहे, हे जाणवले की त्यांच्या संतत्वाशी आपली जवळीक वाढते.

परंतु या चंचलतेवर ते स्वतःच्या सामर्थ्याने विजय मिळवण्याचा गर्व करीत नाहीत; ते विनम्रतेने म्हणतात, “बुद्धी दे रघुनायका. ”

हा ‘दे’ शब्द म्हणजे संपूर्ण शरणागतीचा उत्कट स्वर.

सामाजिक अपुरेपणाची वेदना

“बोलता चालता येना। कार्यभाग कळेचिना॥ बहुत पीडिलो लोकी…”

येथे समर्थांची वेदना अधिक गडद होते. समाजात स्वतःचे अपुरेपण जाणवणे ही फार मोठी मानसिक वेदना असते. लोकांच्या हसण्याने, टोमण्याने, दुर्लक्षाने मन विदीर्ण होते.

“संसारी श्लाघ्यता नाही। सर्वहि लोक हासती॥”

या ओळींतून त्यांच्या मनातील असहाय्यता झिरपते. एक संत म्हणविणारा पुरुष स्वतःला “टोणपा” म्हणतो—याहून मोठी आत्मनम्रता कोणती?

ही वेदना त्यांच्या अहंकाराला भेदून जाते आणि त्यांना अधिकच शरणागत बनवते.

असहाय्यतेचे सावट आणि शरणागतीचा प्रकाश

“चित्त दुश्चित होता हे। ताळतंत्र कळेचिना॥ आळसू लागला पाठी…”

मन, बुद्धी, चित्त, वर्तन—सर्वच स्तरांवर अपयशाची छाया आहे. परंतु समर्थ या अंधारात हरवून जात नाहीत. उलट, त्या अंधारातूनच ते रामरायाच्या चरणांपाशी जाऊन प्रकाश मागतात.

“कायावाचामनोभावे। तुझा मी म्हणवितसे॥ हे लाज तुजला माझी…”

येथे भक्तीचा परमोच्च क्षण येतो. ‘मी तुझा आहे’ ही जाणीव आणि ‘माझी लाज तुला’ हा भाव—हीच खरी भक्तीची पराकाष्ठा. भक्त स्वतःचे अपुरेपण देवाच्या चरणी अर्पण करतो आणि त्याच्या कृपेची याचना करतो.

निराशेच्या उदरात दडलेली आशेची कळी

“आशा हे लागली मोठी। दयाळुवा दया करी॥ आणीक नलगे काही…”

ही ओळ म्हणजे या कवितेचा उत्कर्षबिंदू. सर्व अपुरेपण, दुर्गुण, असहाय्यता—यांच्या पलीकडे समर्थांची आशा अढळ आहे. निराशेच्या उदरात आशेची कळी दडलेली असते; तीच येथे फुलते.

समर्थ अन्य काहीही मागत नाहीत— ना संपत्ती, ना कीर्ती, ना वैभव. ते केवळ “बुद्धी – सद्बुद्धी” मागतात. कारण बुद्धी म्हणजे विवेक, संयम, साधनेचे सामर्थ्य आणि आत्मोद्धाराचा मार्ग.

 समाप्ती : आर्ततेतील सौंदर्य आणि संतत्वाचा पाया

ही कविता म्हणजे संताच्या अंतःकरणातील निर्मळ अश्रूंची माळ आहे. समर्थांची आर्तता त्यांना लहान करत नाही; उलट तीच त्यांच्या संतत्वाचा पाया ठरते.

स्वतःच्या दोषांचे निर्भीड स्वीकार, मनाच्या चंचलतेची जाणीव, समाजातील अपयशाची वेदना, आणि अखेरीस दैवी कृपेची उत्कट याचना—या सर्वांचा संगम म्हणजे “बुद्धी दे रघुनायका. ”

ही कविता आपल्याला शिकवते की, साधनेचा मार्ग हा दोषरहित नसतो; तो दोषांच्या जाणीवेने आणि त्यागाच्या आकांक्षेने उजळतो. जेव्हा साधक आपल्या अपुरेपणाला देवाच्या चरणी अर्पण करतो, तेव्हाच त्याच्या अंतःकरणात खऱ्या बुद्धीचा, खऱ्या प्रकाशाचा उदय होतो.

समर्थांचा हा आर्त स्वर आजही प्रत्येक साधकाच्या अंतर्मनात निनादतो—

“मी कमी पडतोय देवा… मला सद्बुद्धी दे.”

रसग्रहण – श्री दिवाकर बुरसे,

पुणे

संपर्कः ९५ ५ २६ २९ २ ४ ५

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ अश्रु ढाळले किती… कवी : डॉ. निशिकांत श्रोत्री ☆ रसग्रहण – नीलिमा खरे ☆

नीलिमा खरे

? काव्यानंद ?

☆ अश्रु ढाळले किती… कवी : डॉ. निशिकांत श्रोत्री ☆ रसग्रहण – नीलिमा खरे ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

☆ अश्रु ढाळले किती  ☆

तुला न जाणिव स्मृतीत तुझिया अश्रु ढाळले किती

भान विसरले सुन्न जाहले रडले मी एकांती ||ध्रु||

*

पुष्प बहरल्या उपवनातुनी लपेटून गंध

भृंग-कळ्यांना खिजवित दावून अपुली प्रीत धुंद

उरात जपुनी धुंद आठवणी दिवस कंठले किती

अश्रु ढाळले किती ||१||

*

तरूतळी संध्यालाली पसरे मृद्गंधाची साथ

आणा भाका कितीक शपथा हाती होते हात

आता अंधुक सांजेपाठी काजळलेल्या राती

अश्रु ढाळले किती ||२||

*

प्रेम आपुले शोभतसे ते मनिच्या क्षितिजावरती

सौंदर्याची केवळ पखरण काही नाही हाती

जीवन झाले आता मृगजळ उगीच आशा होती

 अश्रु ढाळले किती ||३||

*

तुझ्याचसाठी जीवन जगणे जपले स्वप्न उरी

तुझ्याविना हा काळ कंठला मुग्ध राहुनी जरी

कवटाळुनिया मरण उराशी जगत राहिले अति

अश्रु ढाळले किती ||४||


©️ डॉ. निशिकान्त श्रोत्री
एम.डी., डी.जी.ओ.

रसग्रहण: अश्रु ढाळले किती

माणसाचे आयुष्य म्हणजे केवळ वय वाढणे नक्कीच नाही. नानाविध भावनांची अनुभूती व त्यांचा अविष्कार जीवनात होत असतो.. या भावनांचे प्रकटीकरण करणे, त्यांचे विवरण यथार्थ शब्दातून मांडणे ही आंतरीक भावना सर्वांना असते. कवी मनाच्या लोकांना तर ती नेहमीच खुणावते.. अर्थात काही वेळा हे असे अनुभव कवीचे स्वतःचे ही असूच शकतात.. भावनांना शब्दांचे साज देऊन कवी कविता रुपात ही अनुभूती काव्यरसिकांसमोर सादर करतो. यथार्थ, अर्थवाही, अर्थपूर्ण काव्यरचना करताना कवी त्याच्याकडील शब्दभांडार कवितेच्या रूपावर उधळून देतो. कवितेचे हे शृंगारलेले रूप पाहून, वाचून वाचक /रसिक सहजपणे मोहित होतो. भावनेची प्रांजलता आणि तिचे हे साजिरे रूप घेऊन आलेली, मनावर गारुड करणारी अशीच एक भावकविता वाचण्यात आली. कवी आहेत डॉक्टर निशिकांत श्रोत्री… त्यांच्या निशिगंध या काव्यसंग्रहातील हे भावगीत. आज या कवितेचा आस्वाद घेऊ या.

 “अश्रु ढाळले किती” या शीर्षकावरून या कवितेत विरह /दुःख भावनांचा आविष्कार असणार हे रसिक वाचकांच्या लक्षात येतेच. यथार्थ व अर्थपूर्ण काव्यशीर्षकामुळे वाचकांच्या मनात मनोज्ञ भावनेचे शब्दचित्र नक्कीच तयार होते. या जाणिवेला अतिशय उच्च स्तरावर नेणारी आणि तितकीच भावगर्भितता देणारी ही कविता. काव्यशीर्षकातून उमगलेल्या भाववृत्तीचे अतिशय सुंदर शब्दचित्रण या कवितेत केलेले दिसते.

सर्वप्रथम या ठिकाणी मुद्दाम नमूद करावेसे वाटते की ही संपूर्ण कविता “तिच्या” भावनेशी निगडित आहे. तिच्या अंतरंगातून उमटलेल्या आवाजांचा नाद आहे. कवी पुरुष असूनही त्यांनी या स्त्रीच्या भावनेला पूर्णपणे न्याय देऊन त्या प्रकारची शब्दयोजना आणि भाव या कवितेतून व्यक्त केले आहेत. त्यासाठी लागणारे तरल मन कवीपाशी असल्यामुळेच हे शक्य झाले आहे हे निश्चित…

 

तुला न जाणिव स्मृतीत तुझिया अश्रु ढाळले किती

भान विसरले सुन्न जाहले रडले मी एकांती ||ध्रु||

 

कवितेतील “ती” परिस्थितीवश एकांत भोगते आहे खरं तर एकटी पडली आहे हे म्हणणे योग्य ठरेल. कारण हा एकांत तिच्या दृष्टीने अजिबात सुखावह नाही. तिला अतीव प्रिय असलेल्या प्रियकराचा शाश्वत विरह घडवून नियतीने हा तिच्यावर लादलेला आहे. साहजिकच या नकोनकोशा एकांतात ती स्वतःबरोबरच आजूबाजूच्या लोकांचे ही भान विसरली आहे. “भान हरपणे” न म्हणता “भान विसरले” अशी शब्दयोजना केल्याने कवीचे साहित्यिक भान लक्षात येते. दुःखामध्ये सर्व गोष्टींचा विसर पडतो हे लक्षात घेऊन अशी सुयोग्य शब्दरचना केली आहे. विरहाचा दुःखद धक्का प्राक्तनाने जीवनात तिला दिला आहे. अशा परिस्थितीत अटळ सत्याचे भान ती विसरली आहे हे गर्भित अर्थाने सूचित केले आहे. वरवर साधा सोपा सरळ अर्थ वाटतो पण कवीने सहजपणे गहन अर्थ यातून व्यक्त केला आहे. या सहेतुकपणामुळे कवितेतील तिच्या भावावस्थेकडे प्रकर्षाने लक्ष जाते. ती सुन्न, बधिर होवून जाणिवेच्याही पलीकडे गेलेली आहे. एकांतात ती केवळ रडली आहे. त्याच्या नसण्याने त्याच्या स्मृती तिच्या मनात प्रकर्षाने उचंबळून येतात. आपसूकच तिने अश्रू ढाळले आहेत. “किती” या शब्दांतून अगणित, गणना करता न येणारे हा सूचक भावार्थ अपेक्षित आहे. तिच्या या जाणिवेची त्याला जाणीव नसणारच कारण तो या “अशा” भावनिक जाणीवेच्या पलीकडे गेलेला आहे. ही जाणीव आता त्याला कधीच जाणवणार नाहीये. अतिशय सहजपणे साध्या, सोप्या शब्दांतून मृत्यूचे अटळ सत्य उलगडले आहे. मोजक्या व यथार्थ शब्दातून तिच्या भावनेचा स्तर आणि तीव्रता या ध्रुवपदातून लक्षात येते. अन् म्हणूनच सहजपणे वाचक तिच्या भावनांशी नकळतच जोडला जातो.

 

पुष्प बहरल्या उपवनातुनी लपेटून गंध

भृंग-कळ्यांना खिजवित दावून अपुली प्रीत धुंद

उरात जपुनी धुंद आठवणी दिवस कंठले किती//१//

 

सुमनविकसित उपवनात गंधांची उधळण झालेली असणार हे गृहीत आहे. येथे पुष्पबहर म्हणजे प्रीतीचा बहर. प्रेमाच्या उपवनी प्रीतपुष्पे बहरली.. त्यांचा

गंधदरवळ तनामनावर/तनामनाशी लपेटून घेतला. “लपेटून”शब्द फारच सुंदर व सुयोग्य.. भरपूर प्रमाणात उपलब्ध असलेला व काळजाजवळ असलेला गंध.. लपेटून हा अर्थपूर्ण व अर्थवाही शब्द यासाठी वापरला आहे. विकसित फुलांवर रुंजी घालणारे भुंगे तसेच इतर

अविकसित, अजून न फुललेल्या कळ्या यांना आपल्या धुंद प्रीतीचे प्रदर्शन करुन या युगुलाने खिजवले आहे. इथे भुंगे म्हणजे इतरेतर जे प्रीतीचा गंध व अनुभव घेत आहेत. त्यांच्यापेक्षा आपली प्रीती उच्च दर्जाची तसेच अधिक गहिरी आहे हे जाणवून दिले आहे. कळ्यांचा संदर्भ ज्यांनी अजून प्रेमाचा अनुभव घेतला नाही त्यांच्याशी आहे. “खिजवित” या शब्दातून स्वतःच्या गहिऱ्या प्रेमाचे जाणूनबुजून प्रदर्शन केले हा भाव व्यक्त केला आहे.

या कडव्यात अतिशय कल्पकतेने रूपक, चेतनागुणोक्ती तसेच अतिशयोक्ती अलंकारांचा वापर करून कवीने प्रेमाचा अनोखा स्तर वर्णिला आहे. अशा या धुंद प्रीतिच्या धुंद आठवणी मनात नव्हे तर उरात जपून तिने कितीतरी (अनेक असा अर्थ)दिवस कंठले आहेत.. “उरात”शब्दातून आत्यंतिक जवळ हा अर्थ लक्षात येतो. “कंठणे”म्हणून नाईलाजास्तव ती जगत आहे याकडे निर्देश केला आहे. पहिल्या दोन चरणातले यमक व तिसऱ्या चरणाचे ध्रुवपदाशी साधलेले यमक सहज सुंदर… साहजिकच कवितेला मोहक लय व गेयता लाभली आहे.

 

तरूतळी संध्यालाली पसरे मृद्गंधाची साथ

आणा भाका कितीक शपथा हाती होते हात

आता अंधुक सांजेपाठी काजळलेल्या राती

अश्रु ढाळले किती ||२||

समय /काळ सरत राहिला. सांजवेळ सामोरी आली. अशावेळी झाडाच्या मुळात/अंतरंगात संध्येची लाली पसरते. अन् कातरवेळी कातर झालेल्या काळजाला जणू काही फक्त ओलावलेले डोळे साथ व साद देतात, घालतात. हे वाहणारे अश्रूं जमिनीवर पडून त्याचा गंध (मृद्गंध) मनाला साथ देतो. झाडाची मुळे जशी जमिनीत खोलवर जातात तसेच तिच्या ही मनात प्रीत खोलवर रूजलेली आहे. येथे तरू म्हणजे ती व संध्या म्हणजे वाढलेले वय/आयु… तसेच केवळ त्याच्या आठवणीने तिच्या गाली लाली पसरली असा अजून एक अर्थ.. माणूस अंतिमतः मातीत मिसळतो हे सत्य नाकारता येत नाही. तो गंध तिला साद घालतो आहे असा ही भावार्थ… अतिशय सुंदर रूपक… कवितेतील भावनेला अधिक अर्थ देणारे.. तिला अशा वेळी मनात जाग्या असलेल्या, कधी काळी घेतलेल्या साऱ्या आणाभाका, शपथा पुन्हा एकदा आठवतात. तेव्हा एकमेकांचे हात हातात होते… एकमेकांना एकमेकांची साथ होती, संगत, सोबत होती. आता मात्र अंधुक सांजेपाठी अटळपणे येणाऱ्या काजळलेल्या, काळोख्या रात्री नजरेतून, काळजातून व्यक्त होत आहेत. त्याच्या नसण्याने तिचे आयुष्य अंध:कारमय झाले आहे. प्रीतिचा अस्त म्हणजे रात्र झाली आहे.

 

प्रेम आपुले शोभतसे ते मनिच्या क्षितिजावरती

सौंदर्याची केवळ पखरण काही नाही हाती

जीवन झाले आता मृगजळ उगीच आशा होती

 अश्रु ढाळले किती ||३||

 

या साऱ्या सुखद व दु:खद आठवात तिला प्रकर्षाने जाणवते की त्यांचे हे प्रेम तिच्या मनाच्या क्षितिजावरती शोभून दिसते आहे. अर्थात क्षितिजाप्रमाणे आता ते भासमान व दूरवर आहे. थोडक्यात तिला वास्तवाची जाणीव ही आहे. या रम्य आठवणी आता केवळ मनात जाग्या आहेत. प्रीतिच्या सौंदर्याची काल्पनिक पखरण फक्त हृदयात व हृदयातून आहे. यातले काहीच आता पुन्हा प्रत्यक्षात घडणार नाही. “काही नाही हाती”यातून हातात हात नाहीत, सोबत उरली नाही. शब्दशः हातात हात नाहीत हे जाणवून दिले आहे. तसेच “हाती न लागणे”म्हणजे न गवसणे.. श्लेष फारच छान… प्रीतभावनेने समृद्ध झालेले भावविश्व आता काळाआड गेले आहे.

जीवन हेच मृगजळाप्रमाणे भासमान झाले आहे. त्याच्या प्रत्यक्ष अस्तित्वाची भावना खरी नाही हे तृषार्त मनाला जाणवले आहे. मृगजळाची आशा जशी खोटी असते तशीच आशा आता जीवनाविषयी वाटते आहे. जीवन या शब्दावरील श्लेषही अत्यंत समर्पक. जीवन म्हणजे पाणी व आयुष्य. तिच्या जीवनाला लागलेली प्रेमाची तहान कधीच भागणार नाही हे सत्य तिच्या मनाने स्वीकारले आहे.

 

तुझ्याचसाठी जीवन जगणे जपले स्वप्न उरी

तुझ्याविना हा काळ कंठला मुग्ध राहुनी जरी

कवटाळुनिया मरण उराशी जगत राहिले अति

अश्रु ढाळले किती ||४||

 

त्याच्या अनुपस्थितीत केवळ त्याच्याचसाठी जीवन जगणे हे स्वप्न तिने उरात बाळगले होते. तुझ्याचसाठी मधील “च” भावनेची सत्यता व तीव्रता जाणवून देणारा. तिला स्वतःला जीवनाविषयी कुठल्याही प्रकारची आस राहिलेली नाही. केवळ त्याच्यासाठी जगणे हाच तिच्या जीवनाचा उद्देश होता, ते तिचे स्वप्न होते. ते तिने प्रामाणिकपणे उरात जपले. त्याच्याशिवाय जगताना हा सर्वकाळ तिने मुग्ध राहून, अबोल राहून कंठला. मुग्ध

शब्दातून एखाद्या कळी प्रमाणे ती विकसित न होता जगली. नाईलाजाने जगताना जाणीवपूर्वक मुग्धता राखली. परंतु हा काळ बिलकुल सोपा नव्हता. मरणाला उराशी कंटाळून ती जगत होती. “अति”, या शब्दातून तिला नकोसे असताना व तिला वाटणाऱ्या गरजेपेक्षाही जास्त ती जगली अशी तिची भावना जाणवते. अर्थात त्याच्या शिवाय जगताना सारे आयुष्य “अति” झाले, जास्त झाले. एखादी गोष्ट नको असताना जेव्हा प्रमाणाबाहेर घडते तेव्हा हे “अति झाले” असे आपण म्हणतो.

“जीवन जगणे जपले”, “काळ कंठला” यातील अनुप्रास, पहिल्या दोन चरणातील यमक व शेवटच्या चरणातील ध्रुवपदाशी साधलेले यमक सहज व अर्थपूर्ण वाटते.

 

मनातल्या प्रांजल प्रीतीच्या प्रांजळ भावनेला व आपल्या प्रियकर / पतीच्या शिवाय जगताना जाणवलेल्या अंतरीच्या अनुभूतीला अतिशय काव्यात्मतेने, विविध साहित्यालंकारांनी नटवून या कवितेत प्रस्तुत केले आहे. नैसर्गिक भावनेतील खरेपणा जपून तो लयबद्ध पद्धतीने व्यक्त केला आहे. ही कविता सूर्यकांत या मात्रावृत्तात रचली आहे. काव्यवाचकांना हृदयाला थेट भिडणारे हे सुंदर भावगीत नक्कीच आवडेल. कवीचे तरल मन व साहित्यिक जाणीव कौतुकास्पद.. , मनाला भुरळ घालणारी…

 

© नीलिमा खरे

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /मंजुषा मुळे/गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares