मराठी साहित्य – काव्यानंद ☆ औक्षवंत हो… डॉ निशिकांत श्रोत्री ☆ रसग्रहण.. सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

? काव्यानंद ?

☆ निशाशृंगार… डॉ निशिकांत श्रोत्री ☆ रसग्रहण.. सौ राधिका भांडारकर ☆

☆ – औक्षवंत हो – डॉ निशिकांत श्रोत्री ☆

काजळ घेउनिया नयनीचे तीट लावते तुला

औक्षवंत हो माझ्या बाळे आशीर्वच हे तुला।।ध्रु।।

 

पहिली बेटी ही धनपेटी म्हणती दांभिक सारे

आदिशक्ती तू माझ्या पोटी कौतुक मजला न्यारे

जीवन माझे सार्थ जाहले उधाण आनंदाला

औक्षवंत हो माझ्या बाळे आशीर्वच हे तुला।।१।।

 

सीता तू अन् तूच द्रौपदी तूच जिजाऊ माता

गार्गी बनुनी विदुषी होई तारी या भारता

सुनीता राणी अवकाशाची धन्य मानवी बाला

औक्षवंत हो माझ्या बाळे आशीर्वच हे तुला।।२।।

 

कृतघ्न किती हा मानव झाला तुझ्या जीवावर घाला

वाढविते तू वंशा, निर्घृण तुझाच वैरी झाला

तेजस्विनी हो, सौदामिनी हो,लखलखती  तू ज्वाला

औक्षवंत हो माझ्या बाळे आशीर्वच हे तुला।।३।।

 

पत्नी जरी तू एका क्षणाची माता तू कालाची

संस्काराचे सिंचन करिते सरस्वती ज्ञानाची

गर्भपात ना कधी घडावा अभय मिळू दे तुला

औक्षवंत हो माझ्या बाळे आशीर्वच हे तुला ।।४।।

 

 – डॉ. निशिकांत श्रोत्री.(निशिगंध)

काव्यनन्द

यत्र नार्यस्तु पूज्यन्ते

   रमन्ते  तत्र देवता:।।

पिढ्यानुपिढ्या जपलेलं हे सुंदर विचारांचं, सुसंस्काराचं सुभाषित.  पण प्रत्यक्ष जगताना, अवतीभवतीची पीडित स्त्री जीवनं  पाहताना मनात नक्कीच येतं की सुभाषितं ही फक्त कागदावर. समाज मनावर ती कोरली आहेत का? खरोखरच नारी जन्माचा सोहळा होतो का? स्त्री आणि पुरुष यांचा  दोन व्यक्ती म्हणून विचार करताना सन्मानाच्या वागणुकींचं  पारडं नक्की कुणाकडे झुकतं? आजही एकतरी मुलगा हवाच ही मानसिकता कमी झालेलली नाही. पण जिच्या उदरातून हा वंशाचा दिवा जन्म घेतो तिचा मात्र सन्मान होतो का?

“ तुम्हाला दोन मुलीच?”

 या प्रश्नांमध्ये दडलेला,” मुलगा नाही?” हा प्रश्न बोचरा नाही का?

 अनेक शंका उत्पन्न करणारे असे प्रश्नही असंख्य आहेत. सुधारलेल्या समाजाची व्याख्या करतानाही हे प्रश्न सतत भेडसावत असतातच आणि याच पार्श्वभूमीवर औक्षवंत हो ही डॉक्टर निशिकांत श्रोत्री यांची गीतरचना माझ्या वाचनात आली आणि मी खरोखरच हे काव्य वाचून प्रभावित झाले. त्याचे मुख्य कारण म्हणजे या काव्याचा उगम एका पुरुष मनातून व्हावा याचे मला खूप समाधान आणि तितकेच अप्रूपही वाटले.

हे गीत  वाचल्यावर प्रथमतःच मनासमोर उभी राहते ती प्रेमस्वरूप, वात्सल्य सिंधू आईच. ज्या मातेने नऊ महिने स्वतःच्या उदरात एक गर्भ मोठ्या मायेने  वाढविलेला असतो त्याला जन्म देताना मातृत्वाच्या भावनेने ती ओथंबलेली असते, मग ते मातृत्व मुलाचं की मुलीचं हा प्रश्नच उरत नाही.  कुशीत जन्मलेल्या बाळाची ती आणि तीच फक्त माताच असते.

 काजळ घेऊनिया नयनीचे तीट लाविते तुला

औक्षवंत हो माझ्या बाळे आशीर्वच हे तुला ।ध्रु।।

नुकत्याच सोसलेल्या प्रसूती वेदना ती क्षणात विसरलेली आहे आणि जन्मलेल्या आपल्या कन्येला हातात घेताना प्रथम तिच्या मुखातून उद्गार निघतात,” माझ्या डोळ्यातल्या काजळांचं तीट तुला लावते बाळे,  औक्षवंत हो! दीर्घायुषी हो! हाच आशीर्वाद मी तुला देते.”

या ध्रुपदाच्या  दोन ओळींमध्ये अनेक अर्थ दडलेले आहेत. हा एका नुकतंच मातृत्व लाभलेल्या आईने जन्मलेल्या अथवा तिच्या गर्भात वाढत असणाऱ्या स्त्रीअंकुराला दिलेला आशीर्वाद तर आहेच.  पण औक्षवंत हो म्हणताना कुठेतरी तिच्या मनात भय आहे की माझ्या या  मुलीच्या जन्माचा सन्मान होईल का? तिच्यावर कधी अशी वेळ येऊ नये की तिला अर्धवटच हे जगणं सोडून द्यावं लागेल कारण सद्य समाजाविषयी ती कुठेतरी मनोमन साशंक आहे.

आणि म्हणूनच कदाचित तिला आपल्या बाळीला कुणाचीही नजर लागू नये,सर्व दुष्ट शक्तीपासून तिचे रक्षण व्हावे याकरिता डोळ्यातले काजळरुपी तीट लावावेसे वाटत आहे.

 पहिली बेटी ही धन पेटी म्हणती दांभिक सारे

आदिशक्ती तू माझ्या पोटी कौतुक मजला न्यारे

जीवन माझे सार्थ जाहले उधाण आनंदला

औक्षवंत हो माझ्या बाळे आशीर्वच हे तुला ।१।

“म्हणताना म्हणतात हो सारे, पहिली बेटी धनाची पेटी असते. पण ओठावर एक आणि मनात एक असणारे हे सारेच ढोंगी आहेत. पण मी मात्र तुझी आई आहे. माझ्या उदरी जणू काही तुझ्या रूपानने आदीमायेनेच जन्म घेतला आहे याचा मला सार्थ अभिमान आहे. तुझ्या जन्माने माझी कूस पावन झाली, माझ्या जीवनाची सार्थकता झाली आणि या माझ्या आनंदाला पारावरच नाही. सुखी दीर्घायुष्याचे सगळे मार्ग तुझ्यासाठी मुक्त असावेत हेच माझे आशीर्वचन आहे.”

आशीर्वादाऐवजी कवीने योजलेला आशीर्वचन हा शब्द मला खूपच भावला.  जन्मापासूनच तिने आपल्या कन्येचा योग्य प्रतिपाळ करण्याचा जणू काही वसा घेतला आहे. तिने तसे स्वतःला वचनबद्ध केले आहे असे या शब्दातून व्यक्त होते.

 सीता तू आणि तूच द्रौपदी तूच जिजाऊ माता

 गार्गी बनुनी विदुषी होईल तरी या भारता

 सुनीता राणी अवकाशाची धन्य मानवी बाला

औक्षवंत हो माझ्या बाळे आशीर्वच हे तुला।२।

मुलगी झाली म्हणून त्या मातेला कणभरही कमीपणा वाटत नाही. उलट ती त्या जन्मलेल्या निरागस स्त्री अंशात सीता, द्रौपदी, जिजाऊ माता, विदुषी गार्गी, अगदी अलीकडच्या युगातली अंतराळ वीरांगना सुनीता विल्यमलाच पहात आहे. अशा अनेक गौरवशाली स्त्री व्यक्तिमत्त्वांची तिला आठवण होते आणि आपली ही बालिका ही एक दिवस अशीच दैदिप्यमान कर्तुत्वशाली व्यक्ती असेल असे सुंदर स्वप्न ती पाहते आणि त्या क्षणी पुन्हा पुन्हा ती तिला औक्षवंत हो, कीर्तीवंत हो ,यशवंत हो असे आशिष देत राहते.

कृतघ्न किती हा मानव झाला तुझ्या जीवावर घाला

वाढविते तू वंशा निर्घुण तुझाच वैरी झाला

तेजस्विनी हो सौदामिनी हो लखलखती हो ज्वाला

 औक्षवंत हो माझ्या बाळे आशीर्वच हे तुला।३।

मनातल्या ममतेच्या,वात्सल्येच्या वेगाबरोबरच त्या नुकत्याच, या जगात जन्म घेतलेल्या स्त्री जीवाला दुष्ट, संहारी समाजापासून सावध करण्याचेही भान बाळगते. खरं म्हणजे स्त्री ही सृजनकर्ती, जगाची निर्मिती प्रमुख. तिच्याच उदरातून कुळाचा वंश जन्म घेतो. तिच्याशिवाय ज्याचा जन्मच अशक्य आहे तिचाच मात्र तो वैरी बनतो आणि तिची निर्घृण हत्या करण्यास पुढे सरसावतो. ही केवढी विसंगती आहे!  पण तरीही ही धीरोदत्त माता आपल्या हातातल्या त्या निष्पाप, अजाण, कोवळ्या कळीला समर्थ, सक्षम करण्यासाठी म्हणते,”तू नको कसले भय बाळगूस. तू  मूर्तिमंत तेज हो, थरकाप उडवणारी चपला (वीज) हो, गगनाला भिडणारी लखलखती ज्वाला हो.

तेजस्विनी सौदामिनी ज्वाला हे तीनही शब्द तळपणाऱ्या व्यक्तिमत्त्वासाठीच आहेत. कवीने या तीन शब्दांची औचित्यपूर्ण गुंफण केली आहे. आईच्या मनातले समर्थ, बलवान, धारदार विचार ते सुंदरपणे व्यक्त करतात.

 पत्नी जरी तू एक क्षणाची माता तू कालाची

संस्काराचे सिंचन करते सरस्वती ज्ञानाची

 गर्भपात ना कधी घडावा अभय मिळू दे तुला

औक्षवंत हो माझ्या बाळे आशीर्वच हे तुला ।४।

स्त्री जन्माविषयी असेच म्हणतात ना? क्षणाची पत्नी आणि अनंत कालची माता.  किती सार्थ आहे हे भाष्य! मातृत्व ही अशी भावना आहे किंवा अशी भाववाचक संज्ञा आहे की जिचा काल अनंत आहे. ज्या क्षणापासून तिच्या उदरात गर्भ रुजतो त्या क्षणापासून ते तिच्या जीवनाच्या अंतापर्यंत ती केवळ आणि केवळ माताच असते. स्वतःच्या उदरातून जन्माला आलेल्या तिच्याच अंशाच्या सुखासाठी, स्वास्थ्यासाठी ती अविरत झटत असते. या काव्यामधली ही माता म्हणूनच त्या अंशाला तिच्या जन्माचं महत्त्व पटवून देते. तिला संस्काराचे सिंचन करणारी सरस्वती, ज्ञानदा म्हणून संबोधते आणि निस्सिमपणे एक आशा मनी बाळगते की कळी उमलण्यापूर्वीच  खुडली न जावो. केवळ “मुलीचा गर्भ” हे निदान होताच तिची गर्भातच हत्या कधीही न होवो. आणि म्हणूनच या ठिकाणी औक्षवंत हो या आशीर्वाचनाला खूप व्यापक असा अर्थ लाभतो.

*अनंत कालची माता*हा स्त्रीविषयीचा उल्लेखही खूप विस्तारित अर्थाचा आहे. आयुष्याच्या एकेका टप्यावर पती पत्नीचं नातंही नकळत बदलतं. शृंगारमय यौवनाचा भर ओसरतो आणि त्याच पतीची ती उत्तरार्धातच नव्हे तर वेळोवेळी कशी मातेच्या रुपात भासते हेही सत्य नाकारता येत नाही.मातृत्व हा स्त्रीचा स्थायी भाव आहे. ती पुत्राचीच नव्हे तर पतीचीही माता होते. असंहे मातृत्व खरोखरच अनंतकाली आहे.

 डॉक्टर श्रोत्रींना मी मनापासून वंदन करते, की या गीत रचनेतून त्यांनी स्त्रीचे महात्म्य अधोरेखित करणारा केवढा मौल्यवान संदेश समाजाला दिला आहे! भृणहत्ये विरुद्ध उभारलेलं हे एक काव्यरूपी शस्त्रच आहे.हे गीत वाचल्यावर निश्चितपणे जाणवते ते हे की हे एका कन्येची माता होणाऱ्या अथवा झालेल्या स्त्रीचे मनोगत आहे. कदाचित जन्मलेल्या कन्येशी किंवा गर्भांकुराशी होत असलेला हा एक प्रेमळ,ममतापूर्ण तरीही काहीसा भयभीत, चिंतामिश्रित संवादही आहे.. आपल्या उदरात वाढणारा गर्भ हा मुलीचा आहे असे समजल्यावर तिने सर्व समाजमान्य कल्पनांना डावलून केलेला एक अत्यंत बलशाली निर्धार आहे. तितक्याच समर्थपणे ती  तिच्या गर्भासाठी एक संरक्षक कवच बनलेली आहे.

सर्वच दृष्टीने हे गीत अर्थपूर्ण आणि संदेशात्मक आहे. मातेची महती सांगणारे आहे.

वात्सल्य रसातले तरीही वीरश्रीयुक्त असे रसाळ, भावनिक गीत आहे,

धनाची पेटी तेजस्विनी सौदामिनी ज्वाला आणि ती लखलखती या स्त्रीला दिलेल्या उपमा खूपच सुंदर वाटतात, आणि यथायोग्य वाटतात.

सारे —न्यारे” माता —भारता’ घाला— झाला— जीवाला ही यमके यातला अनुप्रास हा अतिशय डौलदार आहे.

साधी, सहज भाषा, नेमके शब्द अलंकार, वजनदार तरीही अवघड न वाटणारे सुरेख नादमय शब्द यामुळे औक्षवंत हो हे गीत मनावर एक वेगळीच जादू करते. एका वेगळ्याच भावना प्रवाहात अलगद घेऊन जाते.

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – काव्यानंद ☆ अडगळीची खोली … कवी: डाॅ.निशिकांत श्रोत्री ☆ रसग्रहण.. सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆

सौ. ज्योत्स्ना तानवडे

? काव्यानंद ?

☆ अडगळीची खोलीकवी: डाॅ.निशिकांत  श्रोत्री ☆ रसग्रहण.. सौ.ज्योत्स्ना तानवडे  ☆ 

 डाॅ. निशिकांत श्रोत्री

अडगळ हा प्रत्येकाच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग असतो. मग तो अडगळीचा कोपरा घराची एक मागची खोली किंवा पडवी असो किंवा मनाचा कोपरा असो; तो असंख्य वस्तू आणि आठवणी, जुन्या विचारांनी व्यापलेला असतो. एखाद्या दिवशी निवांत वेळी ही अडगळ उपसणे हा मनाचाच कधी आनंददायी तर कधी वेदनादायी खेळ असतो. या अडगळी विषयीच लिहिले आहे डॉ. निशिकांत श्रोत्री यांनी अडगळीची खोली या त्यांच्या कवितेमध्ये. आज आपण या वेगळ्या कवितेचा रसास्वाद घेणार आहोत.

 ☆ अडगळीची खोली ☆ 

जपली आहे मी मोठ्या शर्थीने

एक खोली अडगळीची.

काय कोंबलं त्यात

केव्हा केव्हा

कशाचच भान नाही

 

कळत असो वा नकळत

आयुष्याच्या प्रत्येक वळणावरचा

मैलाचा दगडच काय

बारीक सारीक खडा सुद्धा

दिला भिरकावून त्या अडगळीत

नाही केला विवेक

उपयोगी का निरुपयोगी याचा

जे आले त्या सगळ्यालाच

फक्त माझे माझे म्हटले

दुसऱ्याला द्यायचे तर नावच नाही

 

मन माझे खोली अडगळीची

कोणी कोणी आले

नकळत खोली भरत गेले

आपापल्या स्मृतींनी

आपापल्या मायेनी

आणि खडूस वैराने सुद्धा

त्या सगळ्यांनाच

माझेच म्हटले

परतफेड करायचे कधी

नावही नाही काढले

 

आता मात्र डोकावून पाहतोय मी

मोठ्या आशाळभूतपणे

त्याच अडगळीच्या खोलीत

कुठे सापडतोय का ते पाहायला

परतीचा तर सोडाच

निदान पुढे जायचा तरी मार्ग

जो करेल कमी

या भीरु मनाची अस्वस्थता

गोंधळलेल्या मनाला

करेल कायमचं शांत

आणि देईल करून ओळख

माझ्या खऱ्या शाश्वत अस्तित्वाची

 

पण सापडलीच नाही मला ती वाट

हरवून गेलीय त्या ढिगात

आणि गर्दीत

आयुष्यभर साठवलेल्या

मायेच्या, वासनांच्या, आणि दुस्वासाच्या

षड्रिपूंच्या बंधनात

कसं शोधू मी कसं शोधू

सांगेल का कोणी मला?

लावेल का  कोणीतरी

या खोलीतली अडगळ

नीटनेटकेपणे टापटिपीने

एकदा तरी?

©️ डॉ. निशिकान्त श्रोत्री

९८९०११७७५४

जपली आहे मी मोठ्या शर्थीने

एक खोली अडगळीची

काय कोंबलं त्यात

केव्हा केव्हा

कशाचंच भान नाही

ही कविता मुक्तछंदातील आणि प्रथम पुरुषी एक वचनातील आहे. त्यामुळे कवी आपल्याशी त्याच्या आयुष्याबद्दल सरळ संवाद साधत आहे. अडगळ ही प्रत्येकाच्या घराचा, मनाचा मोठा भाग व्यापणारी एक स्वाभाविक गोष्ट असते. रोजच्या जगण्यातल्या पण आता वापरात नसलेल्या असंख्य गोष्टी आपण मोठ्या जिव्हाळ्याने जपून ठेवतो. हळूहळू हा पसारा वाढत जातो आणि शेवटी ‘धड टाकवत नाही आणि ठेवता पण येत नाही’ अशा या गोष्टींचे अडगळीत रूपांतर होते.

कवीने इथे यासाठी ‘कोंबलं’ हा शब्द अचूकपणे वापरला आहे. या अडगळीतल्या गोष्टी आपण ‘हे असू दे, ते असू दे’ करत त्यावेळी काहीही विचार न करता जागा दिसेल तिथे अक्षरशः कोंबतच असतो. ‘आत्ता असू दे, मग बघू’ एवढीच भावना त्यावेळी मनात असते.

तीच गोष्ट आयुष्यात आलेली माणसे, नातलग,  असंख्य घटना, आठवणी यांचीही असते. मनाचा एक भाग या ठासून  कोंबलेल्या विचारांनी व्यापलेला असतो.  कवीच्या आयुष्यातील अशा अडगळी बद्दल कवी आपल्याशी बोलतो आहे.

कळत असो वा नकळत

आयुष्याचा प्रत्येक वळणावरचा

मैलाचा दगडच काय

बारीक सारीक खडा सुद्धा

दिला भिरकावून त्या अडगळीत

नाही केला विवेक

उपयोगी का निरुपयोगी याचा

जे आले त्या सगळ्यालाच

फक्त माझे माझे म्हटले

दुसऱ्याला द्यायचे तर नावच नाही

आयुष्याच्या वाटचालीसाठी कवीने ‘मैलाचा दगड’ हे रूपक वापरलेले आहे  आपल्या आयुष्यातील अनेक महत्त्वाचे टप्पे, चांगली वाईट वळणं येतात त्यांनाच कवी मैलाचा दगड म्हणतो. म्हणजे चांगल्या उपलब्धी, मोठी कामगिरी यांच्याबरोबरच आपले शिक्षण, नोकरी व्यवसाय, लग्न,मुलंबाळ, खूप आनंदाचे प्रसंग, मोठे आजारपण, अपघात, संकटं अशा अनेक गोष्टी असतात ज्या आपल्या आयुष्याला प्रसंगी वेगळी दिशा देतात. आयुष्यावर खूप मोठे परिणाम करत आयुष्य पुरते बदलून टाकतात.

अशा मोठ्या घटनांच्या चांगल्या वाईट आठवणी, परिणाम, काही वस्तू, फोटो, कागदपत्रं अशा असंख्य,अगदी बारीक सारीक गोष्टी सुद्धा असतात ज्या आपण घरात आणि मनात अगदी जपून साठवत साठवून ठेवतो. त्यातले बारीक सारीक खडे म्हणजे त्या घटनांमुळे मनावर झालेले आघात, उमटलेले ओरखडे जे सतत बोचत राहून मनस्तापच देतात. त्यांनाही आपण जपतो. अशावेळी या सगळ्या गोष्टी उपयोगी आहेत का निरूपयोगी याचा सारासार विचारही आपण कधी करत नाही. जे जे पदरात पडत गेलं ते ते आपलेपणानं स्वीकारलं. त्यामुळे ते इतर कुणाला देण्याचा कधी प्रश्नच येत नाही. कवीही त्याच्या याच अनुभवाबद्दल बोलतो आहे.

मन माझे खोली अडगळीची

कोणी कोणी आले

नकळत खोली भरत गेले

आपापल्या स्मृतींनी

आणि खडूस वैराने सुद्धा

त्या सगळ्यांनाच

माझेच म्हटले

परतफेड करायचे कधी

नावही नाही काढले

आपले मन हे अदृश्य गोष्टींची अडगळीची खोली असते. आपल्या आयुष्यात असंख्य माणसे येतात त्यांच्या आठवणी, त्यांचे चांगले वाईट वागणे, वैर, भांडणे या सगळ्या गोष्टी मनात साठून राहतात. पण एकदा आपण त्यांना आपलं मानलं की या सगळ्या गोष्टी आपोआप आपल्याच होतात. मग कशाचीही परतफेड करायचा प्रश्नच येत नाही. या आठवणी आपल्या मनाला अडगळीची खोली बनवून कायम तिथेच राहतात. आपण त्यांना मनातून काढून टाकत नाही, म्हणजे विसरून टाकत नाही तोपर्यंत त्या मनातून आपण होऊन कधीच बाहेर जात नाहीत.

आता मात्र डोकावून पाहतोय मी

मोठ्या आशाळभूतपणे

त्याच अडगळीच्या खोलीत

कुठे सापडतोय का ते पहायला

परतीचा तर सोडाच

निदान पुढे जायचा तरी मार्ग

जो करेल कमी

या भीरु मनाची अस्वस्थता

गोंधळलेल्या मनाला

करेल कायमचं शांत

आणि देईल करून ओळख

माझ्या खऱ्या शाश्वत अस्तित्वाची

ही मनाची अडगळ आता अस्वस्थ करते. मन सतत बेचैन होते. कारण बऱ्याच आठवणी, अनुभव हे विसरायचे म्हटले तरी विसरता येत नाहीत.  कवीची आता या अडगळीत घुसमट होते आहे. मन घाबरते आहे. आता यातून परतीचा मार्ग तर उरलाच नाही. पण यातून निदान बाहेर पडायचा तरी काही मार्ग आहे का हे कवी आशाळभूतपणे बघतो आहे. पण बाहेर पडायचा मार्ग सापडत नाही. असा एखादा मार्ग, एखादी युक्ती मिळावी ज्यामुळे घाबरलेल्या मनाची अस्वस्थता कमी होईल, गोंधळलेले मन शांत होईल अशी कवी अपेक्षा करतो आहे.

आपली प्रत्येकाची अशीच अवस्था होत असते. या नकोशा आठवणी, घटना, अनुभव मनातून बाहेर काढल्याशिवाय मन स्वच्छ, शांत होतच नाही. कारण या अनावश्यक पसाऱ्यात आपली एक वेगळीच प्रतिमा तयार झालेली असते. पण या जुन्या गोष्टीतले अनावश्यक रुसवे फुगवे, गैरसमजुती जर दूर झाल्या आणि सत्याचे आकलन झाले तर आपल्याच खऱ्या अस्तित्वाची नव्याने ओळख होऊ शकते.  त्यासाठी बाहेर पडता येणारा एखादा मार्ग मिळावा यासाठी कवी फार फार उत्सुक आहे.

पण सापडलीच नाही मला ती वाट

हरवून गेलीय त्या ढिगात

आणि गर्दीत

आयुष्यभर साठवलेल्या

मायेच्या, वासनांच्या, आणि दुस्वासाच्या

षड्रिपूंच्या बंधनात

कसं शोधू मी कसं शोधू

सांगेल का कोणी मला ?

लावेल का कोणीतरी

या खोलीतली अडगळ

नीटनेटकेपणे टापटिपीने

एकदा तरी ?

पण कवीला या अडगळीतून बाहेर नेणारी अशी वाट अजूनही सापडलेलीच नाही. कारण ती वाट त्या पसाऱ्याच्या ढिगामध्ये हरवून गेलेली आहे असे वाटते. खरंतर अशी वाट असतच नाही. कारण अशी अडगळ ही आपली मानसिक, भावनिक गरज असते. राग, लोभ, मोह, माया,मद, मत्सर अशा षड्रिपूंच्या पाशात आपण गुरफटलेले असतो.

यातून पूर्णपणे बाहेर पडण्याची आपली मानसिक तयारी नसते. कारण या जुन्या घटना, त्यांच्या आठवणी या आपल्यासाठी कधी स्फूर्तीदायक असतात, दिशादर्शक असतात तर कधी कधी त्या वेदनादायी निराशाजनकही असू शकतात. पण त्याचवेळी त्या मार्गदर्शकही असतात. पुढे नक्की कसं वागायचं, काय टाळायचं, स्वतःला कसं बदलायचं याचं अचूक मार्गदर्शन आपलंच मन आपल्याला करत असतं.

पण तरीही या मनाच्या गुंत्यात अडकून पडणे ही गोष्ट जीवनाच्या प्रवाहीपणाला अडथळा ठरत असते. अशावेळी मानसिक आजारांचा सामना ही करावा लागू शकतो. कवीही इथे बेचेन आहे. त्यामुळेच तो यातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधतो आहे. किमान कुणीतरी असा मार्ग दाखवावा अशी त्याची अपेक्षा आहे. निदान कुणीतरी या सर्वांचे योग्य वर्गीकरण करून नकोशा गोष्टी काढून टाकत चांगल्या आनंददायी गोष्टी व्यवस्थित आवरून ठेवाव्यात जेणेकरून जगण्याला एक शिस्त लागून जगणे आनंददायी सुलभ होईल या गोष्टीची कवी वाट पाहत आहे.

आपली प्रत्येकाची पण अशीच अवस्था  असते. घरात साठवलेल्या अडगळीतल्या वस्तू आपण निवड करून कमी करू शकतो. नकोश्या गोष्टी टाकून देऊ शकतो. पण मनाच्या अडगळीचे काय करायचे ? त्यातून पूर्ण सुटका कधीच होत नाही. तिथे ‘क्लियर चॅट’चे बटन नसतेच. मनाला योग्य दिशा दाखवत त्याचा पसारा कमी करणे हे शेवटी आपल्याच हातात असते. खरंतर माणसाला स्मृती आणि विस्मृती ही दोन मोठी वरदान लाभलेली आहेत. त्यांचा योग्य समन्वय साधत यातून मार्ग निघू शकतो. याच अडगळीवर डॉ .निशिकांत श्रोत्रींची ही अडगळीची खोली कविता अतिशय सुंदर सखोल असे भाष्य करते.

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

१०/०८/२०२३

वारजे, पुणे.५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – काव्यानंद ☆ ती वेळ निराळी होती…ही वेळ निराळी आहे… श्री अरुण म्हात्रे ☆ रसग्रहण – सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆

सुश्री तृप्ती कुलकर्णी

? काव्यानंद ?

☆ ती वेळ निराळी होती…ही वेळ निराळी आहे… श्री अरुण म्हात्रे ☆ रसग्रहण – सुश्री तृप्ती कुलकर्णी

☆ ती वेळ निराळी होती…ही वेळ निराळी आहे… श्री अरुण म्हात्रे ☆

छातीत फुले फुलण्याची

वार्‍यावर मन झुलण्याची

ती वेळ निराळी होती…. ही वेळ निराळी आहे.

 

डोळ्यात ऋतुंचे पाणी

मौनात मिसळले कोणी

वाळूत स्तब्ध राहताना

लाटेने गहिवरण्याची

ती वेळ निराळी होती…. ही वेळ निराळी आहे.

 

तू वळून हसलीस जेव्हा

नक्षत्र निथळले तेव्हा

मन शहारून मिटण्याची

डोळ्यात चंद्र टिपण्याची …

ती वेळ निराळी होती…. ही वेळ निराळी आहे.

 

ज्या चंद्र कवडशा खाली

कुणी साद घातली ओली

मग चंद्र वळून जाताना

किरणात जळून जाण्याची

ती वेळ निराळी होती…. ही वेळ निराळी आहे.

 

पाऊस परतला जेव्हा

नभ नदीत हसले तेव्हा

कोरड्या मनाने कोणी

गावात परत येण्याची

ती वेळ निराळी होती…. ही वेळ निराळी आहे.

 

थबकून थांबल्या गाई

की जशी शुभ्र पुण्याई

त्या जुन्याच विहिरीपाशी

आईस हाक देण्याची

ती वेळ निराळी होती…. ही वेळ निराळी आहे.

 

गावाच्या सीमेवरती

जगण्याच्या हाका येती

त्या कौलारु स्वप्नांना

आयुष्य दान देण्याची

ती वेळ निराळी होती…. ही वेळ निराळी आहे.

 

हे गाणे जेव्हा लिहिले

मी खूप मला आठवले

शब्दास हाक देताना

आतून रिते होण्याची

ती वेळ निराळी होती…. ही वेळ निराळी आहे.

 – श्री अरुण म्हात्रे 

काही काही गोष्टी आपल्या समोर येण्याच्या वेळा किती अचूक असतात असं ही कविता पुन्हा पुन्हा वाचताना मला जाणवलं. वर्षाचा शेवटचा महिना   मला आठवणींचा महिना  वाटतो… वर्षभरातल्या ज्या काही घडामोडी आहेत त्या एखाद्या चित्रपटातल्या फ्लॅशबॅकप्रमाणे आपल्या नजरेसमोरून तरळत जात असतात. वर्ष आणि वय जसं उलटत जातं तसं भूतकाळाची वही भरायला सुरुवात होते.

या वहीतल्या प्रत्येक पानावर वर्षभरातले अनेक प्रसंग आपल्याही नकळत लिहिले जातात… गंमत म्हणजे काही प्रसंग लिहायचं ठरवलं नसलं तरीही आपसूकच लिहिले जातात. आणि एका छोट्याशा ज्योतीनं सारा आसमंत नजरेत यावा तसे ते प्रसंग कुठल्यातरी एका छोट्याशा जाणिवेतून स्मृतीतल्या एखादा दिवस, विशिष्ट प्रहर लख्ख उजळवून टाकतात.

अरुण म्हात्रे यांच्या या कवितेत या कवीच्या स्मृतिकोषात अशाच काही आठवणी बद्ध झालेल्या आहेत. ज्या साध्या दिवसांनाही ‘विशेष पण’ बहाल करून गेल्या आहेत. प्रत्येकाचा भूतकाळ हा तसा रमणीय असतो. पण कवी हा भूतकाळ ज्या पद्धतीने बघतो ती पद्धत जास्त ‘रमणीय’ असते. कारण त्याला गेलेल्या वेळेची किंमतही माहिती आहे आणि आत्ताच्या वेळेचीही जाण असते. ऋतुंप्रमाणे बदलणाऱ्या निसर्गा इतकंच सहजपणे ऐलतीरावरून पैलतीराकडे बघण्याची ताकद कवी आत्मसात करतो, किंबहुना ते त्याचं बलस्थान असतं.

आर्तता, आत्मीयता, आत्ममग्नता आणि त्याचवेळी आत्मसमर्पणता अशा सगळ्यांच भावना तो कवितांमधून मांडत जातो. इतक्या सहज की जणू सागराच्या लाटेनं जोमाने उसळुन आपलं वेगळेपण सिद्ध करावं आणि ते लक्षात येईस्तोवर समुद्रात तितक्याच वेगाने मिसळून जावं. ‘क्षणाचा जन्म’ आणि ‘क्षणाचा मृत्यू’ इतक्या सुंदर पद्धतीने कवी मांडतो की जणू कविता ही त्याची प्रेयसी असावी आणि तिचं वर्णन करण्याची शब्दांची अहमिका लागलेली असावी.

या कवितेतील ‘ती वेळ निराळी होती… ही वेळ निराळी आहे’ या ओळीतून आपल्यालाही दोन वेळांमधला आणि दोन परिस्थिती, मनस्थिती यांतला फरक चटकन जाणवतो.

मला तर ही कविता कवितेलाच उद्देशून लिहिलीय असं वाटतं. जणू तो कवितेलाच सांगतो आहे ‘ती वेळ निराळी होती… ही वेळ निराळी आहे’. एका टप्प्यावरती आल्यावर कवीनेच आपल्या कवितांकडे तटस्थपणे बघण्याचा आणि तिच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला तर तो याच पद्धतीने तिच्याशी बोलेल.

घटना जेव्हा वर्तमानात घडत असतात तेव्हा प्रत्येक वेळी त्यांना अर्थ असतोच असं नाही. अनेकदा काळ उलटून गेल्यावर त्या घटनांना विशेष अर्थ प्राप्त होतो. या कवितेतल्या सगळ्या कडव्यांमधून कवीला हेच मांडायचं असावं.

येणाऱ्या नव्या वर्षाकडे आशेने पाहताना मागील वर्षातल्या अनेक बारीक बारीक गोष्टी देखील आपण आता अशाच नजरेने पाहतो आणि आपल्याला त्या तेव्हा साधा वाटलेल्या घटनाही, आता विशेष वाटतात. ही जगण्यातली गंमत कवीला खूप छान उमगलेली असते.

मला भावलेली कविता अशी आहे. तुम्हाला ती आणखीन वेगळ्या प्रकारे भावू शकते. कारण आपल्या प्रत्येकाचा भूतकाळ वेगळा आहे आणि त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनही.

©  सुश्री तृप्ती कुलकर्णी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – काव्यानंद ☆ माझे मृत्युपत्र… स्व. वि. दा. सावरकर ☆ रसग्रहण – सुश्री शोभना आगाशे ☆

सुश्री शोभना आगाशे

? काव्यानंद ?

☆ माझे मृत्युपत्र… स्व. वि. दा. सावरकर ☆ रसग्रहण – सुश्री शोभना आगाशे ☆

☆ माझे मृत्युपत्र… स्व. वि. दा. सावरकर ☆

[३]

हे मातृभूमी! तुजला मन वाहियेले

वक्तृत्व, वाग्विभवही तुज अर्पियेले

तुतेंचि अर्पिली नवी कविता रसाला

लेखाप्रती विषय तूंचि अनन्य झाला

त्वत्स्थंडिली ढकलले प्रिय मित्रसंघा

केले स्वयें दहन यौवन-देह-भोगां

त्वत्कार्य नैतिक सुसंमत सर्व देवा

त्वत्सेवनीच गमली रघुवीर सेवा

त्वत्स्थंडिली ढकलिली गृहवित्तमत्ता

दावानलात वहिनी नवपुत्रकांता

त्वत्स्थंडिली अतुल-धैर्य वरिष्ठ बंधु

केला हवी परम कारुण पुण्यसिंधु

त्वत्स्थंडिलावरि बळी प्रिय बाल झाला

त्वत्स्थंडिली बघ अतां मम देह ठेला

हे काय, बंधु असतो जरि सात आम्ही

त्वत्स्थंडिलीच असते दिधले बळी मी

संतान या भरतभूमिस तीस कोटी

जे मातृभक्ती-रत सज्जन धन्य होती

हे आपुले कुलहि त्यांमधि ईश्वरांश

निर्वंश होउनि ठरेल अखंड वंश

[४]

कीं तें ठरो अथवा न ठरो परंतु

हे मातृभू, अम्हि असो परिपूर्ण हेतु

दीप्तानलात निज-मातृ-विमोचनार्थ

हा स्वार्थ जाळुनि अम्हि ठरलो कृतार्थ

ऐसें विवंचुनि अहो वहिनी! व्रतातें

पाळोनि वर्धन करा कुल-दिव्यतेतें

श्रीपार्वती तप करी हिमपर्वतीं ती

की विस्तवांत हसल्या बहु राजपूती

तें भारतीय अबला-बलतेज कांही

अद्यापि या भरतभूमिंत लुप्त नाही

हे सिद्ध होइल असेंचि उदार उग्र

वीरांगने, तव सुवर्तन हो समग्र

माझा निरोप तुज येथुनि हाच देवी

हा वत्स वत्सल तुझ्या पदिं शीर्ष ठेवी

सप्रेम अर्पण असो प्रणती तुम्हांते

आलिंगन प्रियकरा मम अंगनेते

कीं घेतले व्रत न हें अम्हि अंधतेने

लब्ध-प्रकाश इतिहास-निसर्ग-मानें

जे दिव्य, दाहक म्हणुनि असावयाचे

बुध्याचि वाण धरिलें करि हे सतीचें

कवी वि दा सावरकर

(शब्दार्थ – स्थंडिल = यज्ञ, होम इ. करिता केलेला एक हात चौरस व चार अंगुळे उंचीचा मातीचा ओटा, यज्ञपात्र, अंगुळ = बोटाच्या रूंदीचे माप)

रसग्रहण

नाशिकचे कलेक्टर जॅक्सन यांच्या हत्येच्या प्रकरणातील सहआरोपी म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकरांना १९१० च्या मार्चमध्ये लंडन येथे अटक करण्यात आली. तेथील ब्रिक्स्टन जेलमध्ये असतांना ही कविता सावरकरांनी आपल्या वहिनींना, अंतिम निरोप म्हणून पाठविली होती.

‘विश्वात आजवरी शाश्वत  काय झाले’ या कवितेप्रमाणे ही कविता देखिल ‘वसंततिलका’ या अक्षरगणवृत्तांत निबद्ध आहे. या वृत्ताविषयीची माहिती त्या अंकात आलेली असल्यामुळे द्विरुक्ती टाळून आपण अर्थाकडे वळुया.

या कवितेचे चार भाग असून, ती जवळपास ९५/९६ ओळींची आहे. त्यामुळे आपण त्यातला फक्त तिसरा व चौथा भाग पहाणार आहोत. तथापि पहिल्या दोन भागांचा गोषवारा माहितीसाठी देत आहे.

पहिल्या भागांत कवी आपल्या घराचे वर्णन करून तिथे आजूबाजूचे तरूण, तरुणी कसे जमायचे, वहिनी त्यांना सुग्रास  स्वयंपाक करून कशी जेवायला, खायला द्यायची व नंतर अंगणात बसून पारतंत्र्य, अन्याय, जागतिक  घडामोडी यावर कशी चर्चा व्हायची,  मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी काय केले पाहिजे याविषयी जमलेल्या तरूणांना मार्गदर्शन कसे केले जायचे, वीररसपूर्ण अशा कविता म्हटल्या जायच्या वगैरे गोष्टींचा उल्लेख आहे.

दुसर्‍या भागात आपण केलेल्या प्रयत्नांना केवळ आठ वर्षांतच यश येत असल्याचे पाहून कवी आनंदित आहेत. दीनपणा सोडलेले व वीरश्रीचा संचार झालेले देशातील युवक, युवती स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होण्यासाठी सज्ज आहेत. या धगधगत्या यज्ञकुंडात पहिलं बलिदान देण्यासाठी श्रीरामांनी आमंत्रण  दिलेलं असताना, हा बहुमान आपल्या कुटुंबाला मिळावा, ही किती अभिमानाची गोष्ट आहे. ज्या आणाभाका आम्ही घेतल्या, त्याप्रमाणे प्रत्यक्ष वर्तन करून आम्ही कृतार्थ  झालो आहोत. असे वीरश्रीपूर्ण निवेदन करून, सावरकर आपल्या वहिनींनी धैर्यानें अशा प्रसंगांना सामोरं जावं, यासाठी त्याचं मनोबल उंचावत आहेत. ते आठवण करून देतात की आपण हे धगधगते सतीचे वाण, आंधळेपणांने किंवा क्षणिक उत्तेजनाने नाही, तर जाणून बुजून, समजून उमजून हाती घेतले आहे.

तिसऱ्या भागात ते म्हणतात की, मातृभूमीलाच मी माझं मन वाहिले आहे. माझं सारं वक्तृत्व, वाङ्मय तिलाच अर्पण केलय. मी, माझं तारुण्य तसेच सगळ्या देहभोगांचं हवन या स्वातंत्र्य यज्ञामधे केलं आहे. देशकार्य हेच देवकार्य समजून, घरदार, पैसाअडका इतकेच नव्हे तर मित्रपरिवार, वडील बंधू, वहिनी, मुलगा, पत्नी यांनादेखील या यज्ञवेदीवर मी ढकलले आहे. आणि आता त्या वेदीवर आहुती म्हणून बळी जाण्यासाठी माझा देहपण मी ठेवला आहे, आमचा निर्वंश झाला तरी चालेल, पण मातृभूमी स्वतंत्र झाली पाहिजे. आपल्या कुलात नक्कीच  ईश्वरी अंश असला पाहिजे, म्हणूनच आपल्याला हा आहुतीचा मान मिळाला आहे. आम्ही सात बंधू असतो तरी सर्वांनी देशासाठी बलीदान दिले असते. तरी हे वहिनी, जसे पार्वतीने हिमाच्छादित  पर्वतावर तप केलं, जशा हजारो राजपूत स्त्रियांनी हसत हसत अग्निप्रवेश केला, तसेच तुम्ही देखिल या व्रताचे पालन करा. भारतीय स्त्रियांचं तेज लुप्त झालेलं नाही हे दाखवून द्या. इथे कवी, वहिनींना ‘विरांगने’ म्हणून संबोधतात व त्यांना नमन करतात. शेवटी ते पुन्हा एकदा सांगतात की, जर आपण जाणुन बुजून हे सतीचे वाण हातात घेतले आहे, तर अग्नीप्रवेश करण्याची आपली तयारी आहेच. यज्ञवेदीवर चढलो आहोत तर ते हवन होण्यासाठीच!

© सुश्री शोभना आगाशे

सांगली 

दूरभाष क्र. ९८५०२२८६५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – काव्यानंद ☆ निशाशृंगार… डॉ निशिकांत श्रोत्री ☆ रसग्रहण.. सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

? काव्यानंद ?

☆ निशाशृंगार… डॉ निशिकांत श्रोत्री ☆ रसग्रहण.. सौ राधिका भांडारकर ☆

काव्यानंद:

शृंगार हा रसांचा राजा आहे, रसपती आहे.  प्रेम— रती हा शृंगाराचा स्थायीभाव.  शृंगार उत्तान असेल, सात्विक असेल अथवा वियोगातला विप्रलंभ शृंगार असेल  पण मानवी जीवनातच नव्हे तर अवघ्या निसर्गातच या रसराजाचं दर्शन होत असतं.  गीतकार आणि कवी मंडळींचा तर हा लाडका विषय.  मग त्यात प्रेम, संध्याकाळ, नदीकाठ, समुद्रकिनारा तर असतातच पण अग्रभागी असतो तो चंद्र!  प्रियतमेच्या नजरेतला प्रियकर. चित्तवृत्ती फुलवणारी चंद्र, चांदणं, यामिनी यांची शेकडो गीत आज पर्यंत रचली गेली आहेत.  अगदी  महान कवी कालीदासांचे मेघदूत हे काव्य विप्रलंभ शृंगारचे एक अप्रतिम उदाहरण आहे.  असंच एक सुंदर शृंगार गीत घेऊन येत आहेत डॉ. निशिकांत श्रोत्री.  या गीताचं शीर्षक आहे निशाशृंगार ( निशिगंध काव्यसंग्रह)

☆ – निशाशृंगार – डॉ निशिकांत श्रोत्री ☆

असुन रंग काळा रुपेरी हा साज सजली निशा

नटूनी थटूनि घेऊनि येई धुंदी नशा।।ध्रु।

 

हिर्‍यांची कटी मेखला दिव्य शोभे

आकाशगंगा सजविण्यास लाभे

शेल्यावरी कृष्ण नक्षत्र शोभे

अलंकार सजवीत रजनीस या ।१।।

 

जरी रात्र काळी निशानाथ भाळी

किती कौतुकाने मिरवी झळाळी

रिझविण्यास कांता निशा सज्ज झाली

लपेटूनिया भवती दाही दिशा ।।२।।

 

रजनीकांत प्रणये निशा तृप्त झाली

धुंदीस बघुनी हवा कुंद झाली

तृप्त शशांक धन्य ती रजनी

संपन्न हो प्रीतीचा हा वसा ।।३।।

डाॅ. निशिकान्त श्रोत्री.

हे गीत वाचत असताना अक्षरशः अंगावर मोरपीस फिरतं. इतकं नाजूक, इतकं कोमल आणि तरल शब्दातले हे गीत सहजपणे एका धुंद लहरीत तरंगायला लावतं.

असून रंग काळा रुपेरी

हा साज सजली निशा

 नटूनी थटूनि  घेऊनि

 येईल धुंदी नशा …

यात प्रत्यक्ष निशा— रात्रच प्रियतमेच्या भूमिकेत आहे. ही निशा कशी? तर कृष्णवर्णी काळी.  पण तिनेही रुपेरी साज चढवलेला आहे. नटलेली, थटलेली चंदेरी चांदण्याचा पेहराव घातलेली निशा प्रणय भावनेने धुंद झालेली भासत आहे.

 *हिऱ्यांची कटी मेखला दिव्य शोभे

 आकाशगंगा सजविण्यास लाभे

 शेल्यावरी कृष्ण नक्षत्र शोभे

अलंकार सजवीत रजनीस या …

 

प्रथम याओळींचा अन्वयार्थ लावूया.

कटी, हिर्‍यांची मेखला दिव्य शोभे

सजविण्यास आकाशगंगा लाभे

कृष्ण शेल्यावरी नक्षत्र शोभे

अलंकार सजवीत रजनीस या…

खरोखरच ही चार चरणे  वाचल्यानंतर प्रथम मनात येतं ते

जे न देखे रवी ते देखे कवी

 किती सुंदर कल्पनांची ही शब्दसरी!

 निशेच्या साज शृंगारकडे पाहताना कवी म्हणतात, या निशेच्या कमनीय कटीवर— कमरेवर जणूं काही आकाशगंगारूपी हिऱ्यांची  साखळी आहे. आकाशगंगा म्हणजे तारका समूहाचा डोळ्यांना लुब्ध करणारा नभातला एक लांबलचक पट्टाच. आज कवीच्या नजरेत मात्र ही आकाशगंगा  काळ्या निशेचा  हिऱ्यांचा कमररपट्टाच आहे. आकाशातलं चमचमणारं चांदणं, निशेच्या काळ्या शेल्यावर कसं चंदेरी बुट्ट्यांसारखं शोभिवंत वाटत आहे.  खरोखरच या कृष्णवर्णी रजनीने हेच अलंकार चढवून स्वतःला नटवले आहे, सजवले आहे. ते कुणासाठी बरे? पाहूया पुढच्या कडव्यात.

 जरी रात्र काळी निशानाथ भाळी

 किती कौतुकाने मिरवी झळाळी

 रिझविण्यास कांता निशा सज्ज झाली

 लपेटुनिया भवती दाही दिशा…

ही प्रियतमा रात्रीच्या रूपात आहे. ती काळी आहे. पण तिच्या भाळावर —कपाळावर मात्र चमचमणारा, लखलखीत, प्रकाशमय असा शशांक आहे. किती कौतुकाने, अगदी मालकी हक्कानेच ती तिच्या निशानाथाची झळाळी मिरवत आहे!  तिच्या संपूर्ण काळ्या रंगालाच त्याने उजळवून टाकलेले आहे.

 रिझविण्यास कांता या ओळीतला कांता हा शब्द खूपच रसभरीत आहे. प्रणयात किंवा प्रणय भावनेत धुंद झालेली स्त्री ही कांता असतेच. पण या ठिकाणी कांता याचा अर्थ प्रियकर हा आहे आणि या प्रियकराला रमविण्यासाठी ही रजनी पहा कशी  दाही दिशांचं वस्त्र लपेटून तयार झाली आहे.  ही ओळ इतकी तरल आहे की ती वाचताना असे वाटते की प्रणयोत्सुक प्रियतमा जणू कुठल्याशा पारदर्शक वस्त्रातून तिचं कायिक सौंदर्यच प्रियकराला दाखवत आहे.

  रजनीकांत प्रणये  निशा तृप्तझाली

  धुंदीस बघुनी हवा कुंद झाली

 तृप्त शशांक धन्य ती रजनी

 संपन्न हो प्रीतीचा हा वसा…

वा! क्या बात है कविराज?  या काव्यपंक्ती वाचताना मला क्षणभर खजुराहोची कामोत्सुक, शंकर-पार्वतीच्या कामक्रीडेची शिल्पच पाहते आहे की काय असेच वाटले. किती नाजूक! किती तरल हा प्रणय! आणि प्रणय क्रीडेचा हलकेच गाठलेला तो शिखरबिंदू! एक तृप्तीचा क्षण जो रजनीकांताशी झालेल्या काम क्रीडेनंतर निशेने अनुभवलेला. आणि निसर्गातलं हे धुंद प्रणयमग्न युगुल पाहून वातावरणातल्या हवेलाही कशी नशा चढली आहे. तीही कुंद—धुंद झाली  आहे.

ये राते ये मोसम ये चंचल हवा…जणू काही कुठल्यातरी अज्ञात अस्तित्वाच्या अंतरातूनच अस्फूटपणे उद्गार उमटतात,

 तृप्त शशांक धन्य ती रजनी

 संपन्न हो प्रीतीचा हा वसा ..

हा चंद्र ही तृप्त आणि ही रजनीही धन्य!

समागमातला आनंद,मीलनाची आकंठ तृप्ती!

खरोखरच एका दिव्य, रसमय, तरल शृंगाराचा हा सोहळाच जणू काही संपन्न झालेला आहे!

अहाहा! कविराज, खुदा की कसम लाजवाब है।

निशाशृंगार हे गीत म्हणजे चेतनागुणोक्ती अलंकाराचं एक मूर्तीमंत सुंदर उदाहरणच. चेतनागुणोक्ती हा अगदी भावयुक्त अलंकार आहे.  अचेतन गोष्टीला चेतनामय मानून तिला सचेतनाचे गुणधर्म जोडणे हे या अलंकाराचे वैशिष्ट्य आहे.  याकरिता परानुभूती कौशल्याची गरज असते. या अलंकारामुळे कवीच्या कल्पनेला खूप वाव मिळतो आणि कविता अंगोपांगी बहरते.

डॉ. श्रोत्री यांच्या प्रस्तुत निशाशृंगार या गीतात हे प्रकर्षाने जाणवते.  निशा म्हणजे रात्र. एक काळाचा प्रहर खरंतर. पण कवीने या कृष्णकाळ्या रात्रीलाच प्रियतमेच्या रूपात पाहिले आहे.  इथे निशा ही प्रणय धुंद प्रियतमा आणि रजनीनाथ हाच प्रियकर आहे आणि त्यांच्या रुपेरी प्रणायाला गुंफणारं हे अप्रतिम काव्य.  इथे हवेला सुद्धा चैतन्य रूप दिलेले आहे. वास्तविक चेतनागुणोक्ती अलंकार आणि रूपक हे तसे एकमेकात गुंतलेलेच असतात असे का म्हणू नये?  निशाशृंगार या गीतात चेतनागुणोक्ती अलंकार साधणारी निशा, निशानाथ, आकाशगंगा, मेखला, कृष्ण शेला, दिशा ही सारी रूपकेच आहेत आणि ती या गीतात चेतना रूपात आहेत. सचेतन आहेत.

डॉ. श्रोत्रींची ही रजनी जशी निसर्गाने बहाल केलेल्या अलंकाराने झळाळत आहे तसेच हे काव्यही साहित्यालंकाराने सजलेले आहे.

यात आकाशगंगेला निशेच्या कटीवरच्या मेखलेची उपमा दिलेली आहे.किंवा आकाशगंगा म्हणजे जणू काही निशेच्या कटीवरची मेखलाच भासे, असा उत्प्रेक्षा अलंकारही यात आहे.

लपेटूनिया भवती दाही दिशा या काव्यपंक्तीत साधलेला श्लेष अलंकार फारच बहारदार आहे.

एका अर्थी या काळ्या निशेने दाही दिशांचे हे उंची, भरजरी वस्त्र प्रियकराला रिझवण्यासाठी लपेटलेले आहे तर दुसऱ्या अर्थी दाही दिशांचे वस्त्र म्हणजे दिक् + अंबर म्हणजे दिगंबर.  प्रियकराला रिझविण्यासाठी सज्ज झालेली निशा ही दिगंबरावस्थेत आहे.  विवस्त्र आहे आणि या विवस्त्रतेत तिचे समर्पण आहे.   दिशारुपी वस्त्रातला हा श्र्लेष अलंकार थक्क करणारा आहे.  कवीच्या अफाट कल्पनाशक्तीला,दृष्यात्मक प्रतिभेला(visualisation)  दाद द्यावी तितकी थोडीच आहे.

रात्र काळी— निशानाथ भाळी— किती कौतुकाने मिरवी झळाळी या काव्यपंक्तीतला अनुप्रासही अत्यंत लयकारी आहे.  तसेच शोभे— लाभे, भाळी— झळाळी ही स्वरयमके गीताला गेयता देतात.  गीतातल्या ध्रुवपदाशी जुळणारी नशा— दिशा— वसा ही यमकेही सुरेख आणि सहज आहेत. गीताला एक अंगभूत चाल देणारी आहेत. शिवाय या शृंगारिक रात्रीचं एक प्रकारे सुरेख वर्णनच या काव्यात केलेले आहे.  स्वभावोक्तीची ही झलक फारच काव्यात्मक आणि सुंदर आहे.

हे गीत वाचताना सहजच म्हणा अथवा चोरटेपणाने म्हणा उगीचच पर्यायोक्ती अलंकाराचा अविष्कार ही जाणवतो. पर्यायोक्ती अलंकार म्हणजे आडवळणाने किंवा मिस्कीलपणे सांगितलेली गोष्ट . यात अशी कुठली दडलेली गोड गोष्ट आहे की जी कवीला सांगायची आहे?  कवी राजांची माफी मागून अथवा परवानगी गृहीत धरूनच लिहिते, न जाणो या रजनी— शशांकची ही प्रणय घटिका म्हणजे कवीचा स्वतःचाच  काव्यात्मक आधार घेऊन व्यक्त केलेला मधुर अनुभव असेल का?  कारण काव्य हे अनुभूतीतून आणि संवेदनशील मनातूनच प्रसवतं. म्हणून या काव्यात परानुभूतीपेक्षा स्वानुभूतीही जाणवते.   कारण निशा, रजनीकांत हे गीतातले शब्द थोडेसे वैयक्तिक वाटले मला.  कवीच्या नावाशी साधर्म्य साधणारे.  असो अतिरंजीतपणा नको आणि उगीच विनोदही नको.

या पलीकडे जाऊन एकच म्हणेन की शृंगार रसाचे सौंदर्य खुलवणारं, अलंकारिक पण बोजड नसलेलं हे काव्य आहे. उत्तान आणि सात्विक शृंगाराची ही सुरेख सरमिसळ आहे. म्हणून अश्लीलता अजिबात नाही. वाचक अगदी त्रयस्थपणे  कोमल, अत्यंत हळुवार, अलवार, सुंदर प्रणय भावनेच्या प्रवाहात सहजपणे तरंगत राहतो आणि हेच या काव्याचे परमोच्च यश आहे.

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – काव्यानंद ☆ दिपवाळीचे लक्ष्मीपूजन… स्व. वि. दा. सावरकर ☆ रसग्रहण – सुश्री शोभना आगाशे ☆

सुश्री शोभना आगाशे

? काव्यानंद ?

☆ दिपवाळीचे लक्ष्मीपूजन… स्व. वि. दा. सावरकर ☆ रसग्रहण – सुश्री शोभना आगाशे ☆

☆ दिपवाळीचे लक्ष्मीपूजन… स्व. वि. दा. सावरकर ☆

लक्ष्मीपूजन करू घरोघर आम्ही जरी भावे

प्रसन्न पूजेने ना होता लक्ष्मी रागावे

आणि इंग्रज पूजी जरि ना लक्ष्मीची मूर्ती

राबे रिद्धिसिद्धी त्याच्या दाराशी तरि ती

काय बंधुंनो, कारण? रुसली भारतलक्ष्मी कां?

लाथाडुनि दे पूजा अमुची शतकांची देखा

कारण आम्ही सुमें अर्चितो परि ना सुमनानें

विनवू परि ना, विष्णुसम तिला जिंकु विक्रमाने

लक्ष्मीपूजन करावया जैं करितो स्नानाला

परका साबू, परकी तेलें लावू अंगाला

परदेशीचे रेशीम त्याचा मुकटा नेसोनी

देवघरी परदेशी रंगे रंगीत बैसोनी

विदेशातली साखर घालुनि नैवेद्या दावू

अशा पूजनें प्रसन्न होईल लक्ष्मी हे भावू

साबू नेई कोटी, कोटी तेल रुपाया ने

नेई लुटोनी विदेश कोटी अन्य उपायाने

विलायती जी साखर नैवेद्यासी लक्ष्मीच्या

आणियली ती नेत विदेशी कोटी रुपयांच्या

अशा रीतीने लक्ष्मी दवडुनि दाराबाहेरी

लक्ष्मीपूजन करीत बसतो आम्ही देवघरी

आणि विदेशी नळे, फटाके, फुलबाजा अंती

उडवुनि डिंडिम पिटू आपल्या मौर्ख्याचा जगती

अहो हिंदुंनों, कोटी कोटी रुपयांची या दिवशी

लक्ष्मी पूजावयासि लक्ष्मी धाडू विदेशासी

म्हणुनि आम्ही जरी पुजू घरोघर ही लक्ष्मी भावें

प्रसन्न पूजेने ना होता लक्ष्मी रागावे

तरी हिंदुंनों, घरात लक्ष्मी आधी आणावी

विदेशीसि ना शिवू शक्यतो वृत्ती बाणावी

देशी तेलें, देशी साबू, देशी वस्त्रानें

देशी साखर, देशी अस्त्रे, देशी शस्त्रानें

स्वदेशलक्ष्मी पूजू साधुनि जरी मंगलवेळ

गजान्तलक्ष्मी हिंदुहिंदुच्या दारी डोलेल

 – वि दा सावरकर

रसग्रहण

परदेशी वस्तूंवर बहिष्कार घातल्याशिवाय या देशाची भरभराट होणार नाही; ही वस्तुस्थिती सर्वसामान्यांना पटवून देण्यासाठी स्वा. सावरकरांनी ही कविता १९२५ साली रचली. दिवाळीसारख्या सणांच्या वेळी सावरकरांनीच स्थापन केलेल्या हिंदुसभेचे कार्यकर्ते, मेळावे घेऊन, अशा कविता गाऊन, समाजप्रबोधन करण्याचा प्रयत्न करायचे. सर्वसामान्य जनतेला कळावी, पचावी, रुचावी म्हणून सावरकरांनी या कवितेत अगदी सोपी शब्दयोजना केलेली दिसते. तसेच लोकांना सहज पटतील असे दैनंदिन व्यवहारातील दाखले ते देतात. मात्र कितीही सोपी शब्दरचना केली तरी त्यांच्यातला शब्दप्रभू कुठेतरी डोकावतोच. उदा. ‘सुमनें’ वरचा श्लेष किंवा ‘मूर्खता’ साठी वापरलेला शब्द ‘मौर्ख्य’.

लक्ष्मीपूजनादिवशी घराचा दरवाजा उघडा ठेवला की लक्ष्मी घरात येते असा समज आहे. याचाच उपयोग करून कवी सांगतात की, परदेशी फटाके, तेल, साबण, साखर अशा वस्तू वापरून तुम्ही लक्ष्मीला केवळ दरवाजाबाहेरच नव्हे तर देशाबाहेर घालवीत आहात. आपलाच कच्चा माल कवडीमोलाने घेऊन, त्यांच्या देशात बनलेल्या वस्तू हे इंग्रज आपल्याला विकतात व कोट्यावधी रुपये भारतातून लुटून नेतात. अशा परिस्थितीत लक्ष्मी तुमच्या आमच्यावर कशी प्रसन्न होईल. ती रुसून परदेशीच निघून जाणार. याउप्पर आणि परदेशी फटाके वाजवून तुम्ही जणु आपल्या मूर्खतेचा डिंडोराच पिटता. म्हणून हे देशबंधूंनों, आधी देशाबाहेर  जाणाऱ्या लक्ष्मीला थांबवा म्हणजेच एका अर्थाने आधी लक्ष्मीला घरांत घेऊन या व मग तिची पूजा करा.

कविता संपता संपता का होईना पण ‘देशी साखर, देशी अस्त्रे, देशी शस्त्राने’ या ओवीत त्यांच्यातला क्रांतिकारक डोकावतो. ते म्हणतात, देशी वस्त्रे नेसून, देशी साखरेने नैवेद्य बनवून, देशी अस्त्राशस्त्रांने आपण स्वदेशलक्ष्मीची पूजा करू. म्हणजेच स्वातंत्र्यलक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपण सशस्त्र आंदोलन करू. देश स्वतंत्र झाल्यानंतरच हिंदुस्थानातील प्रत्येकाकडे गजान्तलक्ष्मी नांदेल, देशाची भरभराट होईल.

हे विचार जवळ जवळ १०० वर्षांनंतर, सद्यपरिस्थितीत देखिल अचूक लागू पडतात. आपण पहातो की दिवाळी आली की चिनी बनावटीच्या वस्तूंचा बहिष्कार  करण्याची टूम निघते पण विविध कारणांमुळे हे फारच कमी प्रमाणात  साधलं जातं. म्हणूनच महान, द्रष्ट्या कवींच्या कविता ह्या सार्वकालिक असतात असं म्हटलं जातं.

© सुश्री शोभना आगाशे

सांगली 

दूरभाष क्र. ९८५०२२८६५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – काव्यानंद ☆ सायंकाळी रानात चुकलेले कोंकरू… स्व. वि. दा. सावरकर ☆ रसग्रहण – सुश्री शोभना आगाशे ☆

सुश्री शोभना आगाशे

? काव्यानंद ?

☆ सायंकाळी रानात चुकलेले कोंकरू… स्व. वि. दा. सावरकर ☆ रसग्रहण – सुश्री शोभना आगाशे ☆

सायंकाळी रानात चुकलेले कोंकरू... स्व. वि. दा. सावरकर ☆

कां भटकसी येथें बोले। कां नेत्र जाहले ओले

कोणी कां तुला दुखविलें। सांग रे

 

धनी तुझा क्रूर की भारी । का माता रागें भरली

का तुझ्यापासुनी चुकली । सांग रे

 

हा हाय कोंकरु बचडें। किती बें बें करुनि ओरडे

उचलोनि घेतलें कडें। गोजिरें

 

कां तडफड आतां करिसी। मी कडें घेतलें तुजसी

चल गृहीं चैन मग खाशी। ऐक रे

 

मी क्रूर तुला का वाटे। हृदय हें म्हणुनि का फाटे

भय नको तुला हें खोटें। ऐक रे

 

हा चंद्र रम्य जरि आहे। मध्यान् रात्रिमधी पाहे

वृक वारुनि रक्षिल ना हें। जाण रे

 

तो दूर दिसतसे कोण। टपतसे क्रूर बघ यवन

गोजिरी कापण्या मान। जाण रे

 

कमी कांही न तुजलागोनी। मी तुला दूध पाजोनी

ही रात्र गृहीं ठेवोनी। पुढति रे

 

उदईक येथ तव माता। आणिक कळपिं तव पाता

देईन तयांचे हातां। तुजसि रे

 

मग थोपटुनी म्यां हातें। आणिलें गृहातें त्यातें

तो नवल मंडळींना तें। जाहलें

 

कुरवाळिति कोणी त्यातें। आणि घेति चुंबना कुणि ते

कुणि अरसिक मजला हंसते। जाहले

 

गोजिरें कोंकरु काळें। नउ दहा दिनांचे सगळें

मऊमऊ केश ते कुरळे। शोभले

 

लाडक्या कां असा भीसी। मी तत्पर तव सेवेसी

कोवळी मेथी ना खासी। कां बरें

 

बघ येथें तुझियासाठीं। आणिली दुधाची वाटी

परि थेंब असा ना चाटी। कां बरें

 

तव माता क्षणभर चुकली। म्हणुनि का तनू तव सुकली

माझीही माता नेली। यमकरें

 

भेटेल उद्यां तव तुजला। मिळणार न परि मम मजला

कल्पांतकाल जरि आला। हाय रे

 

मिथ्या हा सर्व पसारा। हा व्याप नश्वरचि सारा

ममताही करिते मारा। वरति रे

 

ह्या जगीं दु:खमय सारें। ही बांधव, पत्नी, पोरें

म्हणुनिया शांतमन हो रे। तूं त्वरें

 

तरि कांही न जेव्हां खाई। धरुनियां उग्रता कांही

उचटिलें तोंड मी पाही। चिमुकलें

 

हळु दूध थोडके प्यालें। मग त्वरें तोंड फिरवीलें

कोंकरुं बावरुन गेले। साजिरें

 

स्वातंत्र्य जयांचे गेलें। परक्यांचे बंदी झाले

त्रिभुवनीं सुख न त्यां कसलें। की खरें

 

लटकून छातिशीं निजलें। तासही भराभर गेले

विश्व हें मुदित मग केलें। रविकरें

 

घेउनी परत त्या हातीं। कुरवाळित वरचेवरतीं

कालच्या ठिकाणावरती। सोडिलें

 

तों माता त्याची होती। शोधीत दूर शिशुसाठीं

दगडांचे, तरुंचे पाठीं। हाय रे

 

हंबरडे ऐकू आले। आनंदसिंधु उसळले

स्तनी शरासारखें घुसलें। किती त्वरें

 

डोलतो मुदित तरुवर तो। सप्रेम पक्षी हा गातो

तोकडा प्रतिध्वनि देतो। मुदभरें

 

हे प्रभो, हर्षविसी यासी। परि मला रडत बसवीसी

मम माता कां लपवीसी। अजुनि रे

कवी – वि दा सावरकर

रसग्रहण

नवतरुण सावरकरांनी ही कविता १९०० साली म्हणजे वयाच्या सतराव्या वर्षी लिहिली आहे. ओवी या करूणरसाला पोषक अशा छंदात ही कविता बांधलेली आहे. हे काव्य जरी करूणरसाने युक्त असलं तरिही, कवीने एक सुखान्त प्रसंग यात रेखाटला आहे. हे शब्दचित्र त्यांनी इतकं हुबेहुब रंगवलं आहे की, चलचित्राप्रमाणे तो प्रसंग आपल्या डोळ्यांसमोर घडताना आपण पाहू शकतो. ‘तरि कांही न जेव्हां खाई। धरुनियां उग्रता कांही

उचटिलें तोंड मी पाही। चिमुकलें’ या ओळी वाचताना तर याची प्रचिती येऊन, वाचकाच्या चेहर्‍यावर हसू आल्यावाचून रहात नाही.

ही कविता वाचताना मला शाळेतलं स्वभावोक्ती अलंकाराचं ‘मातीत ते पसरले अति रम्य पंख, केले उदर वरी पांडुर निष्कलंक’ हे प्रसिद्ध उदाहरण आठवलं. पण इथे केवळ शब्दचित्र नाही तर, त्याच्या अनुषंगाने, कवीचे हळुवार मन, त्यांचे प्राणी प्रेम, कणव, पशुहत्येला असणारा त्यांचा विरोध यांचं दर्शन होतं. कवीच्या हृदयात दडलेलं मातृवियोगाचं दुःख व त्या दुःखाला असलेली अध्यात्मिक किनार यांचंदेखील या निमित्तानं प्रकटीकरण होतं. फक्त वैयक्तिक  दुःखाला नाही तर, पारतंत्र्यात राहणाऱ्या सार्‍या भारतीयांच्या दुःखाला पण ही कविता स्पर्शून जाते.’त्रिभुवनीचं सुख सुद्धा स्वातंत्र्य गमावलेल्यांना आनंद देऊ शकत नाही’ असं कवी सांगतात.

सावरकरांना शब्दप्रभू किंवा भाषाप्रभू का म्हटलं जातं याची प्रचिती याही कवितेत येते. उदाहरणार्थ, ‘वृक वारुनि रक्षिल ना हे’ (म्हणजे मी तुझी भूक भागवून तुझे रक्षण करीन) किंवा ‘

विश्व हे मुदित मग केले। रविकरें’ (सकाळ झाली, ही साधी गोष्ट किती गोड शब्दात सांगितली आहे). कोंकराला आई भेटल्यानंतर फक्त त्या दोघांनाच वा कवीलाच आनंद झालेला नाही तर, या आनंदात निसर्ग  सुद्धा सहभागी झाला आहे, ‘डोलतो मुदित तरुवर तो। सप्रेम पक्षी हा गातो’ असं कवी म्हणतात.

अशी छंदबद्ध व यमक, स्वभावोक्ती अशा अलंकारांनी नटलेली तसेच जाता जाता सहजपणे ‘संसार दुःखमय आहे’, विश्वाचा पसारा मिथ्या आहे’ अशी त्रिकालाबाधित सत्य सांगणारी कविता सावरकर एवढ्या कोवळ्या वयात लिहितात यावरूनच त्यांच्या बुद्धीची झेप दिसून येते. त्रिवार नमन!!

© सुश्री शोभना आगाशे

सांगली 

दूरभाष क्र. ९८५०२२८६५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – काव्यानंद ☆ विश्वांत आजवरि शाश्वत काय झालें?…. स्व. वि. दा. सावरकर ☆ रसग्रहण – सुश्री शोभना आगाशे ☆

सुश्री शोभना आगाशे

? काव्यानंद ?

☆ विश्वांत आजवरि शाश्वत काय झालें?… स्व. वि. दा. सावरकर ☆ रसग्रहण – सुश्री शोभना आगाशे ☆

विश्वांत आजवरि शाश्वत काय झालें?... स्व. वि. दा. सावरकर ☆

पौर्वात्य खंड अवघें जित यत्प्रतापें

दारिद्रय आणि भय कांपति ज्या प्रतापें

नाशासि पारसिक तेहि पलांत गेले

विश्वांत आजवरि शाश्वत काय झालें?

 

तें जिंकी पारसिक, दे जगता दरातें

जें दिग्जयी बल तुझेंहि शिकंदरा, तें

ध्वंसीत रोम तव राजपुरीं रिघालें

विश्वांत आजवरि शाश्वत काय झालें?

 

साम्राज्य विस्तृत अनंत असेंचि साचें

त्याही महाप्रथित रोमपत्तनाचें

हूणें हणोनि घण चूर्णविचूर्ण केलें

विश्वांत आजवरि शाश्वत काय झालें?

 

हा उन्नती अवनतीस समुद्र जातो

भास्वान् रवीहि उदयास्त अखंड घेतो

उत्कर्ष आणि अपकर्ष समान ठेले

विश्वांत आजवरि शाश्वत काय झालें?

 

जे मत्त फारचि बलान्वित गर्ववाही

उद्विग्न- मानस उदासहि जे तयांहीं

हें पाहिजे स्वमनिं संतत चिंतियेलें

विश्वात आजवरि शाश्वत काय झालें?

     कवी – वि दा सावरकर

रसग्रहण

ही कविता ‘वसंततिलका’ या अक्षरगणवृत्ते बांधलेली आहे. एकवीस मात्रा व १४ अक्षरांच्या ओळी असणारे हे वृत्त वीर रस व शौर्य भावनेला पोषक आहे. प्रत्येक ओळीच्या शेवटी दोन गुरू (प्रत्येकी दोन मात्रांची दोन अक्षरे) येत असल्यामुळे कोणताही विचार, वाचक अथवा श्रोत्यांवर ठसविण्यासाठी ही वृत्तरचना उपयुक्त आहे. सावरकरांची ‘माझे मृत्युपत्र’ ही कवितादेखिल याच वृत्तात निबद्ध आहे. जाता जाता सावरकर निर्मित ‘वैनायक’ वृत्ताचा उल्लेख केल्याशिवाय राहवत नाही. त्यांनी अंदमानात असतांना रचलेल्या ‘निद्रे’, ‘सायंघंटा’, ‘मूर्ती दुजी ती’, ‘मरणोन्मुख शय्येवर’ यासारख्या कांही कविता तसेच ‘कमला’ व ‘गोमंतक’ (उत्तरार्ध) ही दीर्घ काव्ये त्यांनी स्वनिर्मित ‘वैनायक’ वृत्तांतच रचलेली आहेत. एखाद्याच्या प्रतिभेचा संचार किती विविध प्रांतात असावा! अलौकिक!!

प्रस्तुत कविता सावरकरांनी, पुणे येथे फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकत असताना, १९०२ साली ‘आर्यन विकली’ साठी रचली. कालांतराने ती ‘काळ’ मध्येही प्रसिद्ध झाली. त्यावेळी त्यांचं वय होतं अवघं १९ वर्षांचं! खरं तर हे वय, निसर्गात भरून राहिलेल्या सौंदर्याचं वर्णन करणार्‍या कविता किंवा शृंगाररसाने युक्त प्रेमकविता करण्याचं! पण सावरकरांनी मातृभूमीलाच मन वाहिलेलं असल्यामुळे, तिच्या स्वातंत्र्या शिवाय दुसरा कोणताच विचार त्यांच्या मनात येत नसावा. प्रखर बुद्धीमत्ता घेऊन जन्माला आलेल्या या तरूणाने, आपलं तारुण्य स्वातंत्र्य देवतेच्या चरणी अर्पण केलं होतं. अफाट वाचन, चिंतन, मनन यामुळे त्यांच्या या बुद्धीमत्तेला तेज धार आलेली होती. त्यामुळेच कोवळ्या तरूण वयात ते शाश्वत/ अशाश्वत यासारख्या विषयावर भाष्य करू शकतात. ते म्हणतात या विश्वात कोणतीच गोष्ट शाश्वत नाही. मग ती चांगली असो वा वाईट, हवीशी असो वा नकोशी! याच्या पुष्ट्यर्थ ते निरनिराळी उदाहरणे देतात.

आपल्या पराक्रमाने ज्यांनी अवघ्या पौर्वात्य खंडावर राज्य केलं, ज्यांच्या राज्यात सुखशांती व सुबत्ता नांदत असे अशा पारसिक म्हणजेच पारशांचं साम्राज्य सिंकंदराने नष्ट केले. म्हणजेच त्यांना जिंकून, त्यांचं शिरकाण करून तसेच धर्मांतर करायला लावून आपलं मुस्लीम साम्राज्य स्थापन केलं. अशा जगज्जेत्या सिकंदराचं जे सत्ताकेंद्र होतं, त्या ग्रीसवर कालांतराने रोमन लोकांनी कब्जा केला. परंतु पुढे जाऊन हूणांच्या रानटी टोळ्यांनी या अजिंक्य समजल्या जाणाऱ्या रोमन साम्राज्याचे तुकडे तुकडे केले. अशा प्रकारे उन्नती पाठोपाठ अवनती येतेच. जे जे म्हणून निर्माण होते, ते ते कालांतराने नष्ट होतेच. जे उदयाला येते त्याचा अस्त होणार हे ठरलेलेच आहे. हे ठसविण्यासाठी ऐतिहासिक दाखल्यांपाठोपाठ कवी, समुद्राची भरती ओहोटी, सूर्याचा उदयास्त असे निसर्गातले परिचित दाखले देतात आणि विचारतात, या विश्वात काय चिरंतन राहिलं आहे? ही गोष्ट बलवान, गर्विष्ठ, उन्मत्त यांच्याप्रमाणेच उदास, उद्विग्न असणाऱ्यांनी देखिल लक्षात ठेवली पाहिजे. कोणतीच स्थिती वा परिस्थिती, मग ती ऐहिक असो वा भावनिक, कायम रहात नाही. ती बदलतेच.

या कवितेतून सर्व भारतीयांना कवी विश्वास देऊ इच्छित असावेत की, भारतमातेची ही दुःस्थिती बदलणार व स्वातंत्र्याचा सूर्योदय होणार हे निश्चित!

© सुश्री शोभना आगाशे

सांगली 

दूरभाष क्र. ९८५०२२८६५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – काव्यानंद ☆ कथा… सौ. उज्वला केळकर ☆ रसग्रहण.. सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

? काव्यानंद ?

☆ कथा… सौ. उज्वला केळकर ☆ रसग्रहण.. सौ राधिका भांडारकर ☆

रसग्रहण

जे सत्यात नसते ते कधी कधी स्वप्नात दिसते. स्वप्ने कुणीही पहावीत.  कधी कधी स्वप्ने इतकी सुखद असतात की ती संपूच नयेत, त्यातून जाग येऊ नये असेच वाटते.  पण तसे होत नाही.  सुखद स्वप्नांतून सत्यात आल्यानंतर पुन्हा एकदा मळकट वास्तवाची जाणीव मनाला कातरते. काहीशा अशाच भावनांना निरखून लिहिलेली सुश्री उज्ज्वला केळकर यांची ही कविता…

☆ – कथा – सौ. उज्वला केळकर  ☆

मरगळल्या दिशा

गच्च भरलेलं आभाळ

आंधारा वर्ग अधिकच काळवंडलेला

पिसाट वारा छ्प्पर फाडून आत आलेला.

फुटक्या कौलारातून  निथळणारं पाणी

उसवल्या बाहीतून ठिबकतय खांद्यावर

उठवतय शहारा अंगावर.

पोरं टोरं

कळकट, मळकट

केस विस्कटलेली, शर्ट फाटलेली

बसली आहेत, निमूटपणे

कथा ऐकत

कुणा सुशील, सुंदर राजकान्येची

तिला पळवून नेणार्‍या

कुणा दुष्ट भयंकर राक्षसाची

प्रेमळ यक्षाची आणि धाडसी राजपुत्राची.

आणि मग सारा वर्गच जातो बनून यक्षनगरी

चमचमणारी, झगमगणारी

प्रेमळ गुरुजी वाटतात, यक्षांचे राजे

वाटा दाखवणारे, वर देणारे

सारी मुलेच मग बनतात राजपुत्र

भरजरी पोशाख ल्यालेले, तलवार घेतलेले

आणि निघतात सोडवायला

त्या सुशील, सुंदर राजक्न्येला

आणि इतक्यात

शाळेचा शिपाई येतो राक्षस बनून.

घंटेची आरोळी ठोकून,

टाकतो सारी कथाच विस्कटून 

टाकतो सारी कथाच विस्कटून.  

मुक्तछंदातील ही कविता वाचल्यानंतर आपण कुठल्याशा अविकसित,दैन्यावस्थेतल्या दलीत, पीडीत अशा भागात जाऊन पोहोचतो.  तिथले  जीवन अत्यंत निकृष्ट,निकस आहे.  कुठल्याही प्रगतीच्या खाणा खुणा नसलेल्या या भागातल्या शाळेत शिकून जीवनाला फुलवू  पाहणाऱ्या, आकार देऊन पाहणाऱ्या लहान मुलांच्या केविलवाण्या राज्यात व्यथित अंतकरणाने जातो.

मरगळल्या दिशा गच्च भरलेलं आभाळ

अंधारा वर्ग अधिकच काळवंडलेला

पिसाट वारा छप्पर फाडून आत आलेला

फुटक्या कौलारातून निथळणारं पाणी

उसवल्या बाहीतून ठिबकतय खांद्यावर

उठवतय शहारा अंगावर

या काव्यपंक्तीतून कवियत्रीने स्वतःच्या मनातल्या संवेदना व्यक्त केल्या आहेत..  असे एक वातावरण जे खरं म्हणजे स्वतः अनुभवलेलं  नसल्यामुळे प्रत्यक्ष दिसणाऱ्या विदारक दृश्यामुळे त्यांचे मन हेलावते. 

एका खेड्यातल्या शाळेचं हे चित्र. आधीच तेथील लोकांचे जीवन दिशाहीन, मरगळलेलं.  त्यातून आकाश ढगांनी भरलेलं, अंधारलेल्या वर्गात अधिकच काळोख आणणारं. नुसतं एवढंच नाही तर त्यातून छप्पर पाडणारा सुसाट वारा आणि गळणारे पाणी जे फाटक्या कपड्यातल्या विद्यार्थ्यांना भिजवत आहे.  त्या बाल विद्यार्थ्यांची ही  शैक्षणिक दशा पाहून कवियत्रीच्या अंगावर अक्षरश: शहारे उभे राहतात.

कळकट मळकट

केस विस्कटलेली शर्ट फाटलेली

बसली आहेत

निमुटपणे

कथा ऐकत

हे कळकट, मळकट, केसावर कधीही कंगवा न फिरवलेली विस्कटलेल्या केसांची, फाटक्या कपड्यातील मुले मात्र गुपचुप शांत बसून गुरुजी सांगत असलेल्या कथेत रमली आहेत.

कुणी सुशील सुंदर राजकन्येची

तिला पळवून नेणाऱ्या

कुणा दुष्ट भयंकर राक्षसाची

प्रेमळ यक्षाची आणि धाडसी राजपुत्राची

गुरुजी सांगत असलेल्या कथेत एक सुंदर राजकन्या आहे.ती सुशीलही आहे. तिला कुणा दुष्ट, भयंकर राक्षसाने पळवलेले आहे. मात्र तिच्या रक्षणासाठी प्रेमळ यक्ष— सेवक, तसेच धैर्यवान राजपुत्र ही आहेत.

 आणि मग सारा वर्गच जातो बनून यक्षनगरी

चमचमणारी झगमगणारी

प्रेमळ गुरुजी वाटतात यक्षाचे राजे

वाटा दाखवणारे वर देणारे

या कथेच्या माध्यमातून ती सारी कळकट मुले खरोखरच मनाने एका जादुई नगरीत— जी चमचमणारी लखलखणारी आहे  तिथे जाऊन रमतात. त्या झगमगाटाने प्रफुल्लित होतात.  त्या क्षणी कथा सांगणारे गुरुजी म्हणजे मुलांना त्या यक्ष नगरीचे सम्राट वाटतात आणि तेच आपल्या आयुष्याची वाट आखणार आहेत, सुंदर जीवनासाठी आशिष देणार आहेत याची खात्री मुलांना वाटते.

 सारी मुलेच बनतात राजपुत्र

 भरजरी पोशाख ल्यालेले

 तलवार घातलेले

 आणि निघतात सोडवायला

 त्या सुशील सुंदर राजकन्येला

कथेत रमलेल्या मुलांना आता वाटायला लागते की ते स्वतःच राजपुत्र आहेत. त्यांच्या अंगावर भरजरी पोशाख आता आहेत.  हातात तलवारी आहेत आणि राक्षसाच्या तावडीत सापडलेल्या सुंदर राजकन्येला सोडवण्यासाठी ते आता समर्थ आहेत.

या चार ओळी म्हणजे उज्वला ताईंच्या या काव्यातला गर्भितार्थ  सांगणाऱ्या, शिखर गाठणाऱ्या ओळी आहेत. वरवर  ही जरी परिकथा वाटत असली, सरळ सरळ अर्थ सांगणारी राजकन्येची गोष्ट  वाटत असली तरी त्या कथेशी मनाने जोडल्या गेलेल्या मुलांचे स्वप्नविश्व, भाव विश्व फुलवणारी आहे. भरजरी पोशाख, तलवारी,राजकन्या,राजपुत्र, राक्षस हे रूपकात्मक शब्द आहेत. यातून कधीतरी मरगळलेल्या जीवनाला सौंदर्य आणि गळून गेलेल्या मनाला आत्मविश्वास मिळण्याची आशा दिसून येते. या कथेतील सुंदर राजकन्या म्हणजे एक सुरेख जीवन आणि राक्षसांच्या तावडीत सापडलेली राजकन्या म्हणजेच या सुंदर जीवनावरचे दारिद्र्याचे मळकट आवरण आणि  ते दूर करण्याचं बळ आपल्याही हातात आहे हा विश्वास त्या मुलांना मिळतो.

आणि इतक्यात

शाळेचा शिपाई येतो राक्षस बनून

घंटेची आरोळी ठोकून

टाकतो सारी कथाच विस्कटून

टाकतो सारी कथाच विस्कटून…

कथेतला सुखद शेवट कल्पित असतानाच तास संपल्याची घंटा शिपाई वाजवतो आणि घंटेचा तो कर्कश्श आवाज ऐकल्यानंतर सुंदर कथेचा सारा पटच उधळून जातो. कथा तिथेच अर्धवट विस्कटून जाते.

इथे उज्वला ताईंनी शाळेच्या शिपायाला राक्षसाची उपमा दिली आहे.  आणि हा राक्षस रुपी शिपाई म्हणजेच मुलांच्या आयुष्यातलं दुःखद वास्तव आहे. राजकन्या, राजपुत्राची कथा म्हणजे सुखद स्वप्न आणि तास संपल्याची घंटा म्हणजे वास्तवाची जाणीव. पुन्हा तेच नैराश्य. तीच उदासीनता.तेच मळकट दैन्य. दिशाहीन आयुष्य.

आणि त्यातूनच उमटणारे अनेक विदारक प्रश्न. या मुलांची आयुष्यं कधी उजळणारच नाहीत का? या मुलांना सुंदर भविष्य बघण्याचा अधिकारच नाही का? प्रगतीचे वारे यांच्यापर्यंत कधी पोहोचणार? शहरे यच्चयावत सुविधांनी सजत असताना खेडोपाडीचे हे दैन्य दूर करण्याचे आवश्यक कार्य कोण, कधी आणि कसे करणार?

उज्ज्वला ताईच्या  कथा या सरळ साध्या कवितेतून जणू  त्यांनी सहृदयतेने  संवेदनशील सामाजिक प्रश्नांनांच स्पर्श केलेला आहे.  काव्यातल्या प्रत्येक ओळीतून झिरपणाऱ्या वेदनांना त्यांनी एक लक्षवेधी सामाजिक स्वरुप दिलेले आहे. आपण सारे आपल्याच  सुखात रमलो आहोत पण आपल्या झोळीतील काही गोजीरवाणी सुखे, आनंद या नुसतेच स्वप्न पाहणाऱ्या मुलांच्या  ओंजळीत कधी पडणार?

या   कवितेतून व्यक्त होणारी उज्वला ताईंची सामाजिक जाणीव, कळकळ ही वंदनीय आहे.

जाता जाता इतकेच म्हणेन,” एक सुंदर संदेश देणारी, डोळे उघडे ठेवून आजूबाजूचे जग सह नुभूतीने पाहायला लावणारी दमदार, अर्थपूर्ण कविता— कथा.”

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – काव्यानंद ☆ हिंदुजातीचा श्री पतितपावन धावा…. स्व. वि. दा. सावरकर ☆ रसग्रहण – सुश्री शोभना आगाशे ☆

सुश्री शोभना आगाशे

? काव्यानंद ?

☆ हिंदुजातीचा श्री पतितपावन धावा… स्व. वि. दा. सावरकर ☆ रसग्रहण – सुश्री शोभना आगाशे ☆

पूर्वपिठीका –

इंग्रज सरकारला विनंती करून, त्यांच्या अटी मान्य करून अंदमानातून मुख्य हिंदुस्थानात येण्यामागचा सावरकरांचा मुख्य उद्देश राष्ट्रसेवा हाच होता. त्यांना माहित होतं की अंदमानात जेलमधून राहून आपण देशासाठी कांहीच करू शकणार नाही. तेच हिंदुस्थानच्या मुख्य भूमीवरून आपण अप्रत्यक्षरित्या का होईना स्वातंत्र्यचळवळीचा भाग होऊ शकू. निदान या कार्यासाठी लोकांना प्रेरित  करू शकू. त्यासाठी अखिलहिंदू एकतेचं महत्व लोकांच्या गळी उतरवून जातीपातीमुळे विखुरलेला हिंदुसमाज एकसंध व्हावा यासाठी प्रयत्न  करू. परकियांच्या ‘divide and rule’ या धोरणाला त्यावाचून खीळ बसणार नाही.

अखेर अंदमानातून आणून रत्नागिरी इथे सरकारने त्यांना स्थानबद्धतेत ठेवल्यानंतर चार महिन्यातच त्यांनी हिंदूसभेची स्थापना केली व आपले स्थानबद्धतेतील पहिले भाषण दिले, अस्पृश्यता निर्मूलन कार्याची मुहूर्तमेढ रोवली. सकलहिंदुएकतेचं आपलं ध्येय त्यानी सात वर्षांतच गाठलं व रत्नागिरी इथं श्रीपतीतपावन मंदीर  उभारलं, जिथं सर्व जातींच्या हिंदूंना मुक्त प्रवेश होता; इतकंच नव्हे तर गाभाऱ्यात जाऊन पूजापाठ करण्याची, वेदमंत्रोच्चाराची मुभा होती. हिंदुएकता व अस्पृशता निर्मूलनावर त्यांनी अनेक कविता रचल्या व त्या विविध संघटनांद्वारे, विविध ठिकाणी, विविध समारंभातून जाहीर रित्या गायल्या गेल्या अशा प्रकारे समाज प्रबोधन करून त्यांनी ही सामाजिक  चळवळ पुढे नेली. थोर समाजसुधारक कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे, आपल्या एका भाषणात म्हणाले होते, “मी आयुष्यभर अस्पृश्यता निर्मूलनासाठी काम केलं पण अवघ्या सात वर्षांतच  या निधड्या छातीच्या वीराने जी सामाजिक क्रांती घडवली आहे ती पाहून मी इतका प्रसन्न झालो आहे की देवाने माझं उरलेलं आयुष्य त्यांनाच द्यावं.”

सावरकरांच्या प्रेरणेतूनच शेठ भागोजी कीर यांनी रत्नागिरी येथे साकारलेल्या पतितपावन मंदिरात देव प्रतिष्ठेचा अभूतपूर्व  समारंभ २२ फेब्रुवारी १९३१ रोजी झाला तेंव्हा सर्व  जाती, उपजातीचे पाच हजारांहून अधिक हिंदू जमले होते. अनेक सामाजिक व राजकीय नेते, संतमहंत तसेच वेदान्ताचे गाढे अभ्यासक, ‘महाभागवत’ डाॅ शंकराचार्य  कुर्तकोटी हे प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. त्याप्रसंगी सर्व जाती, उपजातीच्या वीस हिंदु युवतींनी सावरकरांचे हे गीत एक कंठाने गायले.

हिंदुजातीचा श्री पतितपावन धावा... स्व. वि. दा. सावरकर ☆

उद्धरिसी गा हिंदुजातिसी केंव्हा

हे हिंदुजातिच्या देवा ॥ धृ. ॥

आब्राम्हण चंडाल पतितची आम्ही

तुम्ही पतितपावन  स्वामी

निजशीर्ष विटाळेल म्हणुनि कापाया

चुकलो न आपुल्या पाया

आणि पायांनी राखु शुद्धता साची

छाटिले पावलांनाची

ऐकू न पडो आपुलिया कानाते

मुख कथी न म्हणुनि ज्ञानाते

निज सव्यकरे वामकरा जिंकाया

विक्रियली शत्रुला काया

करु, बंधूसी बंद करु दारा, जे

चोर ते घराचे राजे

हे पाप भयंकर  झाले । रे

पेरिले फळाला आले। रे

हृदि असह सलते ते भाले । रे

उद्धार अता! मृत्युदंड की दे वा

हे हिंदुजातिच्या देवा! ॥१॥

 

अनुताप परी जाळितसे या पापा

दे तरि आजि उःशापा

निर्दाळुनि त्या आजि भेद – दैत्यासी

ये हिंदुजाति तुजपाशी

ते अवयव विच्छिन्न सांधिले आजि

तू फुंकी जीव त्यामाजी

देऊनि बळा वामनासि ह्या काळी

तो घाल बळी पाताळी

जरि शस्त्र खुळा कर न आमुचा कवळी

परि तुझी गदा तुजजवळी

जरि करिसी म्हणू जे आता। रे

म्हणशील करू ते नाथा । रे

उठू आम्ही परि दे हाता। रे

दिधलासि जसा कंस मारिला तेंव्हा

हे हिंदु जातीच्या देवा ॥२॥

     कवी – वि दा सावरकर

रसग्रहण

सावरकरांच्या सर्वच कविता गेय आहेत कारण त्या वृत्तबद्ध  आहेत. बहुतांश कविता जरी विविध मात्रावृत्तात बांधलेल्या असल्या तरी त्यांनी इतर वृत्तांचा वापर देखिल केलेला आहे.

या कवितेत ते पतितपावनाचा धावा करीत आहेत. अस्पृश्यता पालनामुळे हिंदु धर्माचे नुकसान कसे झाले व आता आम्ही ती चूक सुधारण्याचा प्रयत्न करीत असताना आम्हाला तुमच्या सहाय्याची कशी आवश्यकता आहे, हे या कवितेत कवी पटवून देतात. आम्ही पापी आहोत, संपूर्ण हिंदु समाजच पतीत आहे, पण तुम्ही पतितपावन आहात तर तुम्ही आमचा हा हिंदु समाजपुरूष एकसंध करून आमचा उद्धार करा.

वेदांनी ब्राम्हणांना समाजपुरूषाचे मस्तक मानले आहे तर शूद्रांना पाय. कवी म्हणतात आमच्या मस्तकाला विटाळ होऊ नये म्हणून आम्ही आमचे पाय तोडले, इतकच नव्हे तर पायांनी देखिल आपली शुद्धता राखण्यासाठी पावलं तोडली. म्हणजे जसे सवर्णांनी दलितांना दूर लोटले तसेच शूद्रांनी पण अतिशूद्रांना दूर केले, सामावून घेतले नाही.

कानांनी ज्ञान ग्रहण करू नये म्हणून मुखाने त्याचा उच्चार केला नाही. म्हणजे ब्राम्हणांनी शूद्रांना वेदाध्ययनापासून म्हणजेच ज्ञानार्जनापासून वंचित  ठेवलं.

क्षत्रियांनी देखिल अशाच चुका केल्या. डाव्या हाताला जिंकण्यासाठी उजव्या हाताने आपलं पूर्ण शरीरच शत्रूला  विकलं. जसे जयचंदाने पृथ्वीराजास जिंकण्यासाठी महंमद घोरीला आपलं स्वातंत्र्य विकलं. सख्ख्या भावाला घरात कोंडून चोराच्या हातात आम्ही जामदारखान्याच्या किल्ल्या दिल्या. असं करून आपण आपलच नुकसान करून घेत आहोत हे आम्हाला कळलं नाही.

आता आम्हाला आमच्या चुका समजल्या आहेत. आम्ही पश्चातापदग्ध आहोत. आमच्या चुकांमुळेच हिंदु समाजपुरूष पंगु झाला आहे. आता याची जाणीव आम्हाला झाली आहे.

हा सल भाल्याप्रमाणे आम्हास  टोचतो आहे. आता आम्ही हे तोडलेले अवयव जोडले आहेत पण त्यात जीव येण्यासाठी, एकसंधता येण्यासाठी तुझ्या कृपेची आवश्यकता आहे.

तेंव्हा हे हिंदूंच्या देवा, तूच आम्हाला सहाय्य करून आमचा उद्धार तरी कर नाहीतर मृत्युदंड तरी दे. भेदाभेद राक्षसाचे निर्दालन करून आम्ही तुला शरण आलो आहोत, तरी आम्हाला उःशाप दे.

कंसासारख्या दुष्ट प्रवृतींचे उच्चाटन करण्यासाठी जसा तू आम्हाला मदतीचा हात दिलास तसाच आताही दे जेणेकरून अशा समाजविघातक कुप्रथांचे उच्चाटन करून हा हिंदुसमाजपुरुष एकसंध व बलशाली होईल. एवढीच विनंती मी तुला करतो आहे.

© सुश्री शोभना आगाशे

सांगली 

दूरभाष क्र. ९८५०२२८६५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈