सावरकरांनी ही कविता १९२६ साली म्हणजेच ते रत्नागिरी येथे स्थानबद्धतेत असताना लिहिली आहे. या कवितेमध्ये मांडलीय एक साधी गोष्ट- माला गुंफणे व ती आपल्या आराध्याला अर्पण करणे. पण या साध्या गोष्टीला सावरकर जी अध्यात्मिक उंची व भावनिक खोली देतात ती पाहून अचंबित व्हायला होतं. त्यांच्या उत्तुंग प्रतिभेची भरारी सामान्य विरहिणी पासून प्रकृतीदेवीपर्यंत झेप घेते व त्यांची अफाट कवीकल्पना, फुलांपासून ते भूकंपांपर्यंत व सूर्यमालेपासून अश्रुंपर्यंतच्या माला गुंफते. सूर्यमालेची माला, भूकंपांची माला या कल्पनांची कल्पनासुद्धा करणं अन्य कोणाला अशक्य आहे.
जगन्माता जगदंबा त्रिगुणातीताला म्हणजेच शंकराला बेलाच्या पानांची माला घालते. बेलपत्र हे पार्वतीचं रूप आहे. मंदराचल पर्वतावर एकदा पार्वतीच्या घामाचे थेंब पडले व त्यातूनच बेलाचा वृक्ष निर्माण झाला अशी मान्यता आहे. या वृक्षाच्या मुळांत ती गिरिजा रूपात, बुंध्यात माहेश्वरी रूपात, फांद्यात दाक्षायणीच्या, पानांत पार्वतीच्या, फुलांत गौरीच्या व फळांत कात्यायनीच्या रूपात वास करते असं मानलं जातं.
प्रकृती व पुरुष यांनी ब्रम्हदेवाच्या आज्ञेवरून, ब्रम्हांड निर्मिती केली. म्हणून सावरकर म्हणतात प्रकृतीदेवी, विराटासाठी म्हणजेच ब्रम्हासाठी नवग्रहांच्या नवनवीन
सूर्यमाला गुंफित आहे.
कालीमाता हे दुर्गेचे रौद्र रूप आहे. ती स्मशानात राहते व मुंडमाला धारण करते. तसेच महाकाल हे शंकराचे रौद्र रूप आहे तो देखिल स्मशानात राहतो व मुंडमाला धारण करतो. कालीने शुंभ, निशुंभ तसेच चंड व मुंड या असुरांना ठार करून ती मुंडमाला शंकराला अर्पण केली अशी कथा आहे.
सृष्टीदेवी तिच्या निर्मिकाला घालण्यासाठी भूकंपांची मालिका निर्माण करते. कवी येथे हे सत्य अधोरेखित करतात की, निर्मिती व नाश यांचं खूप जवळचं नातं आहे किंवा या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.
सत्यभामेसाठी श्रीकृष्णांनी स्वर्गातून पारिजातक आणला असं मानलं जातं. त्यामुळे सत्यभामा श्रीहरींसाठी पारिजातकाची माला गुंफते आहे.
सुंदर, आकर्षक अशी राणी, वैभवाचे प्रतीक असलेली मोत्यांची माळ आपल्या पतीसाठी म्हणजेच राजासाठी ओवते आहे.
शृंगाराचं प्रतीक असणारी फुलांची माला, साक्षात् शृंगार असलेल्या अनंगासाठी म्हणजेच कामदेव मदनासाठी त्याची पत्नी रती ओवते आहे. रती व मदन यांनी शृंगारिक अविर्भावांनी शंकराचा तपोभंग केल्यावर, क्रोधित शंकरांनी मदनाची जाळून राख केली मात्र नंतर उःशाप म्हणून त्याला शरीरविरहित (अनंग) अवस्थेत कुणाच्याही शरीरात शिरण्याची मुभा दिली; म्हणूनच मदनाला अनंग म्हणतात.
विरहात झुरणारी प्रेमिका मात्र आपल्या प्रियासाठी अश्रूंची माळ ओवते आहे म्हणजेच अश्रु ढाळते आहे. प्रदीर्घ कारावासामुळे सावरकर व त्यांच्या पत्नी माई यांनी विरहयातनांची झळ चांगलीच अनुभवली होती. त्या आठवणींची मालाच ते या ओळीतून गुंफित असतील काय?
निसर्ग हा एक जादुगार आहे. त्याच्या कला त्याच्या लीला अगाध आहेत. फक्त पाहण्याची दृष्टी हवी. रोज उगवणारा सूर्य, त्याची रोज पृथ्वीवर येणारी किरणे! या किरणांच्या मार्गात एखादी वस्तू आली की, किरण थटतात त्यामुळे त्या वस्तूंची सावली पडलेली दिसते. एका साध्या सोप्या शास्त्रीय आधाराने स्पष्ट करण्याजोगी घटना त्यामुळे कधीच त्याचं कुतूहल वाटलं नाही.
पण ह्याच सावलीचं निरीक्षण केलं तर त्यात आश्चर्य वाटण्याजोगी विविधता आढळते. प्रत्येक वस्तूची सावली निराळया प्रकारची असते. नारळाची सावली पाहिली की आईच्या पायाला घट्ट धरून मिठी मारणा-या बाळाची आठवण होते. असं वाटतं की ही सावली नारळाचे पाय घट्ट पकडते आहे. नारळानं तिला कितीही दूर ढकलंल तरी ती पाय सोडत नाही.
वेलीची सावली पाहिली की वाटतं जणू वेलीनं सावलीला अभयदान दिलं आहे. त्यामुळे हे निरागस बाळ खाली स्वच्छंदपणे नाचतयं बागडतंय. पण त्याचं वेलीपासून फार लांब जायचं धाडस होत नाही. त्यामुळे वेलीच्या आसपास खेळतंय. आंब्याची सावली निवांत पहुडलेली असते. सर्वांना सामावून घेणारी, शांत असते. हिच्या सावलीत शिरलं की इतकं सुरक्षित वाटतं की, आपल्याला आपल्या सावलीचंही भय रहात नाही. चिंचेची सावली कशी भेदरलेली, घाबरलेली आहे असं वाटतं. तिचं अस्तित्व इतकं अस्पष्ट असतं की वाटतं ती पळून जाण्यासाठी मार्ग षोधतेय पण तिला मार्ग सापडत नाहीय. तिला मोठयांदा ओरडावं असं वाटतयं पण आवाज फुटत नाहीय. एखाद्या झुडपाची सावली कशी अस्तित्वच हरवल्यासारखी, असून नसल्यासारखी!
माणसाची सावली मात्र दिवसभरात निरनिराळी रूपं घेऊन येते. सकाळी उगवत्या सूर्याबरोबर नव्या आशा, नवा उत्साह घेऊन येते. त्यावेळी सावली किती तजेलदार दिसते. आपली सोबत करते, दिलासा देते. पण दुपारच्या भयाण शांततेत कुणाची तरी सोबत हवी असं खूप वाटत असतं, त्यावेळी नेमकी गायब होते. आपल्याला एकटं सोडून! संध्याकाळी थकलेल्या निराश झालेल्या मनाला दिलासा द्यायचा सोडून लांब निघून जाते भरकटत, त्या मनासारखीच! आणि उदास करून जाते. काळोख्या रात्री घाबरलेलं मन नकळतच आसपासच्या आवाजांचा, हालचालींचा कानोसा घेत असतं, आणि त्यांना अचूक टिपण्याचा प्रयत्न करत असतं. त्यावेळी ही नको असणारी सावली हळूच येते आणि भिती दाखवून जाते. एकटेपणाची जाणीव कुठेतरी खोल रुतवून जाते.
अशी ही सावली तिचे अनेक आकार, अनेक रूपं. कांही मनाला भावणारी, तर कांही मनाचा थरकाप करणारी! सांगून, पाहून, वर्णन करून न संपणारी!!
जीवनात चढउतार येतात, मानापमानाचे खेळ सुरू असतात. बरेचदा अपयश, बदनामीमुळे मानसिक, शारीरिक होरपळ होते. यातूनही नव्या जिद्दीने पुन्हा उभे रहात नवा डाव सुरू होतो. अशाच एका जिद्दी, नव्या उमेदीने पुन्हा डाव मांडणाऱ्या माणसाचे मनोगत डॉ. निशिकांत श्रोत्री यांनी ‘फिनिक्स’ या कवितेत मांडले आहे. तिचाच आज आपण रसास्वाद घेणार आहोत.
आयुष्यात अपयशाचा, संकटांचा पुन्हा पुन्हा तोच दाहक अनुभव मी घेतला आहे. त्या धगीने नकळतच मी शरीराने आणि मनानेही पूर्णपणे होरपळून निघालो आहे.
या कवितेचे शीर्षकच कवितेचे सार सांगत आहे. आपल्याच राखेतून नवा जन्म घेत आकाशात झेपावणारा पक्षी म्हणजे फिनिक्स. पौराणिक कथांमध्ये त्याला अमरपक्षी म्हणतात. स्वतःच्या राखेतून उठण्याच्या क्षमतेमुळे त्याला अमर म्हटले जाते. अशीच विजिगीषू वृत्ती असणाऱ्या एका परिस्थितीशी लढणाऱ्याचे हे मनोगत.
मुक्तछंदात असणारी ही कविता प्रथम पुरुषी एकवचनात लिहिलेली आहे. कवी मोकळेपणाने आपण आयुष्यात अनुभवलेले दाहक प्रसंग कथन करीत परिस्थितीशी संवाद साधतो आहे. या अनुभवाने आपण पूर्णपणे गलितगात्र झाल्याचे सांगत आहे. अपयश, बदनामी, प्रेमभंग, अपमान अशासारख्या गोष्टींनी पुन्हा पुन्हा या प्रसंगाला सामोरे जातो आहे. त्याची तीव्रता दाखवायला नुसते पुन्हा पुन्हा असे न लिहिता पुन:पुन्हा पुन:पुन्हा असा प्रभावी शब्दप्रयोग केलेला आहे.
क्षणभर बरं वाटलं
अजूनही मन शिल्लक आहेत तर…
… जिवंत आहे
विश्वास बसत नव्हता !
या अवस्थेची जाणीव झाली. संवेदना जागी झाली आणि खूप बरं वाटलं. कारण हे जाणवण्या एवढं माझं मन अजून सावध आहे म्हणजे मी अजून जिवंत आहे. पण खरंच माझा यावर विश्वासच बसत नाही.
बसलेल्या कठोर आघाताने आपण जणू निष्प्राण झालो, पूर्ण उमेद खचल्याने धुळीला मिळालो अशीच कवीची भावना झालेली असते. पण संवेदना जागृत आहेत हे लक्षात आल्यावर आपण अजून जिवंत आहोत ही जाणीव त्याला होते आणि थोडसं निर्धास्त पण वाटतं.
हे सुखही क्षणभराचंच
दुर्लक्ष करता येत नव्हतं
बसणाऱ्या चटक्यांकडे
अन् होरपळून निघालो
याच ज्वाळांच्या
भाजून काढणाऱ्या आठवणींनी !
मी जिवंत आहे या जाणिवेचे सुख क्षणीकच ठरले. कारण त्या दाहकतेने बसणाऱ्या चटक्यांकडे दुर्लक्ष करता येत नव्हतं आणि त्यांच्या त्या भयावह आठवणींनी पुन्हा पुन्हा जीव पोळून निघत होता.
अशा जीवघेण्या आघातामुळे होणारे शारीरिक मानसिक त्रास, चटके हे नेहमी दृश्य असतात. ते सोसावेच लागतात. त्यामुळे विसरता येत नाहीत आणि त्यांच्या आठवणी या जास्त त्रासदायक असतात. त्यामुळे आपण आता संपलो असे वाटून आत्मविश्वास रसातळाला जातो.
आता मात्र ठरवलंय
जळून खाक व्हायचं
…नेहमीसारखंच
पण यावेळी मात्र
उठायचं नाही परत फिनिक्ससारखं
पुन्हा भाजून घ्यायला
अन् पुन्हा जाळून घ्यायला ?
आता मात्र मी ठरवलंय असा पुन्हा अनुभव आला की, नेहमीसारखं त्यात जळून खाक व्हायचं. म्हणजेच नेस्तनाबूत व्हायचं. पण आता या राखेतून त्या फिनिक्स पक्षासारखं पुन्हा उठायचं मात्र नाही. पुन्हा होरपळत त्यात नव्याने जाळून घ्यायचं नाही. म्हणूनच आता पुन्हा कसलाही प्रयत्न करायचा नाही. जिवंत असूनही मेल्यासारखे जगायचे.
कवी झालेल्या होरपळीने इतका गलितगात्र झाला आहे की, आता पुन्हा पुन्हा हा अनुभव घ्यायची त्याची तयारी नाही. त्यामुळे त्याने आता पुन्हा उभारी घ्यायचीच नाही. असंच उध्वस्तपण सोसत रहायचं असा निर्धार केला आहे.
का केलास मग तो
हळुवार संजीवन स्पर्श
माझं मन आणि शरीर
जळून उरलेल्या
या तप्त राखेला
पुन्हा एकदा जन्म द्यायला
एका नव्या फिनिक्सला ?
या दाहक आघाताने जणू जळून राख झालेल्या माझ्या तापलेल्या मन आणि शरीराला तू का तुझा संजीवन देणारा स्पर्श केलास ? आता यातून पुन्हा एकदा नव्या फिनिक्सला जन्म द्यायचा काय ?
इथे कवीला कुणीतरी आधाराचा हात देणारे, मानसिक उभारी देणारे, पुन्हा लढण्याचे बळ देणारे भेटलेले आहे. त्यामुळे तो पुन्हा उभा राहतोय. पण त्याला या पुन्हा पुन्हा येणाऱ्या अपयशाची, कटू अनुभवाची जबरदस्त भीती वाटते आहे. त्यामुळे तो त्या सुहृदाला विचारतो, ” का मला संजीवन देणारा तुझा स्पर्श केलास ? का माझी जीवनेच्छा पुन्हा जागृत केलीस ? “
झाल्या आघाताने कवीचे मानसिक खच्चीकरण होते. त्यातून तो सावरतो. पुन्हा उभा रहातो. पुन्हा कोसळतो. त्याची असह्य तगमग होते. ही सारी मानसिक, भावनिक आंदोलने सहजसुंदर शब्दरचनेत मांडण्यात कवी अतिशय यशस्वी झालेला आहे.
या कवितेत फिनिक्स या रूपकाचा खूप छान उपयोग केलेला आहे. परिस्थितीने पूर्ण हतबल झालेला कवी पुन्हा नव्या उभारीने परिस्थितीला सामोरे जात नव्याने डाव मांडतो. यासाठी योजलेले फिनिक्सचे रूपक अगदी यथार्थ आहे.
ही कविता प्रथम पुरुषी एकवचनात असली तरी प्रत्येकजणच आपल्या आयुष्यात अशा परिस्थितीला केव्हा ना केव्हा सामोरा गेलेलाच असतो. त्यामुळे ही कविता फक्त एकट्या कवीची न रहाता सर्वस्पर्शी होते. कारण असे अनुभव हे सार्वत्रिक असतात. हे अनन्योक्ती अलंकाराचे छान उदाहरण म्हणता येईल.
माणसाला आयुष्याच्या वाटचालीत कधी शत्रूकडून त्रासदायक आघात, व्यवहारात, व्यवसायात पूर्ण अपयश, मित्रांकडून फसवणूक, जोडीदाराकडून प्रेमात अपेक्षाभंग अशा जीवघेण्या अनुभवांना तोंड द्यावे लागते. तो मोडून पडतो. शारीरिक, मानसिक होरपळ होते. आत्मविश्वास लयाला जातो. अशावेळी एखादा मित्र, एखादा हितैषी, जिवलग, जोडीदार आधाराचा हात देतो. पाठीशी खंबीर उभा राहतो. मनाची उभारी वाढवून पुन्हा लढण्याचे बळ देतो. पुन्हा वाटचाल सुरू होते. पुन्हा अशा अनुभवाची पुनरावृत्ती होते. पण माणसाची दुर्दम्य इच्छाशक्ती, जबरदस्त जीवनेच्छा गप्प बसू देत नाही. त्यामुळे पुन्हा नव्या उमेदीने तो जगण्याला सामोरा जाण्यास तयार होतो.
अशाच पद्धतीने लढणाऱ्याच्या मानसिक आंदोलनाचा एक सुंदर आलेख कवी डॉ. निशिकांत श्रोत्री यांनी फिनिक्स मध्ये मांडलेला आहे.
या कवितेचा आकृतीबंध मोठा लोभस आहे. प्रत्येक कडव्यात यमकाने अलंकृत चार छोट्या ओळी व तद्नंतर प्रत्येक कडव्यात ध्रुवपदाशी नातं सांगणाऱ्या दोन मोठ्या ओळी. सर्व आठ कडव्यांतल्या या सोळा मोठ्या ओळी व ध्रुवपदाच्या दोन अशा अठराच्या अठरा ओळी अज्ञाताच्या बंद घरा/दाराविषयी भाष्य करतात व संबोधनात्मक, रे (अरे) ने संपतात. यामुळे कवीची आर्तता, अगतिकता अधोरेखित होते तसेच यामुळे कविता एवढी गेय होते की आपण ती वाचतावाचताच गुणगुणू लागतो.
सावरकरांनी ही कविता ते अंदमानात २५+२५ अशी ५० वर्षांची काळ्या पाण्याची शिक्षा भोगत होते, तेंव्हा लिहिलेली आहे. आपण कल्पनाही करू शकणार नाही, की ५० वर्षांचा तुरुंगवास झालेल्या माणसाची मनःस्थिती कशी असेल. त्यातून तो माणूस असा की ज्याला मातृभूमीसाठी फक्त राजकीय नाही तर सामाजिक क्रांती देखिल घडवून आणण्याची तीव्र इच्छा होती. तुरुंगवासांत आपलं जीवन व्यर्थ जाणार. आपल्या हातून देशसेवा घडणार नाही या विचाराने त्यांना हतबलतेची जाणीव झाली असेल. हे विश्व संचलित व नियंत्रित करणार्या अज्ञात शक्तीला याचा जाब विचारावा किंवा त्यालाच यातून बाहेर पडण्याचा मार्ग पुसावा असं वाटलं असेल. किंवा कदाचित मृत्यूने येथून सुटका केली तर पुन्हा भारतमातेच्या उदरी जन्म घेऊन परदास्यातून तिच्या सुटकेसाठी प्रयत्न करावे असंही त्यांना वाटलं असेल. यासाठी त्या अज्ञाताच्या घराचा बंद दरवाजा किती काळ आपण ठोठावत आहोत पण तो उघडतच नाही असा आक्रोश सावरकर या कवितेत करत आहेत. ही आठ कडव्यांची कविता सावरकरांच्या त्यावेळच्या मनःस्थितीचं दर्शन घडविते.
ध्रु.) अज्ञाताचं घर हे जीवनमृत्यूच्या आदिपासून अंतापर्यंतच्या चक्राकार मार्गावरचे स्थान आहे. जीवनाचे सगळे मार्ग येथूनच सुरू होतात व याच रस्त्याला येऊन मिळतात.
1) सावरकर त्या अज्ञातास उद्देशून म्हणतात, तुझे स्तुतीपाठक म्हणतात म्हणून, मी त्यांच्यावर विश्वसलो, मला वाटले की तुझ्या घरी मला थोडा विसावा मिळेल. पण तुझ्या घराचं बंद दार ठोठावून मी दमलो तरी ते उघडतच नाही.
2) ही भूमी विशाल आहे. तुझ्या घराचं न उघडणारं दार असं ठोठावित बसण्यापेक्षा मी कुणाच्याही घरी जाऊन थोडी विश्रांती घेईन पण तुझ्या घरापाशी येणार नाही कारण ही वज्राप्रमाणे कठीण असलेली तुझ्या घराची दारे सदोदित बंदच असतात.
3) पोथ्यापुराणांतून ज्ञानी माणसांनी सांगितलेल्या राजे राजवाड्यांच्या कथा ऐकून, त्यांच्या मार्गावरून मी युगांचे ‘मैलाचे दगड’ओलांडत त्यांच्या घरी जाऊ लागलो तर त्या मार्गाच्या शेवटी तुझेच घर होते.
4) दुंदुभि, नगारे यांच्या आवाजांच्या कल्लोळात क्रांतीवीर जेथे बेभान होऊन नाचत होते त्या मार्गावर मी त्यांच्यातलाच एक होऊन चालू लागलो तर त्या मार्गाच्या शेवटी पण तुझेच घर होते.
5) मी नटून थटून या मिरवणुकीत सामील झालो. ही मिरवणूक कुठून कुठे जात आहे हे ठाऊक नसतानाही नाचत नाचत त्या वाटेवरून जाऊ लागलो तर ती वाट स्मशानात जाऊन पोचली व तिथेही तुझेच घर होते.
6) हे सगळं सोडून मग मी मिणमिणत्या प्रकाशातल्या, उदास अशा एकांत मार्गावरून जाऊ लागलो. तो उंच सखल रस्ता चढ उताराचा, वळणावळणाचा होता पण तो सुध्दा शेवटी तुझ्या घरापाशीच जाऊन पोचला.
7) तुझ्या घराकडे जाणारा राजमार्ग सोडून मी दुसर्या घराच्या शोधार्थ अरुंद रस्त्यावरून, अणुरेणूंच्या बोगद्यातून जाऊन पाहिलं पण शेवटी तुझ्या घरापाशीच येऊन पोचलो.
8) तू आपलं घर उघडत नाहीस, दुसरं बांधू देत नाहीस. माझे प्रयत्न निष्फळ ठरत आहेत पण मला प्रयत्न सोडून देऊन बसणं पण प्रशस्त वाटत नाही म्हणून मी पुनःश्च तुझ्या घराची बंद दारं ठोठावत आहे.
सावरकर अज्ञात शक्तीला उद्देशून म्हणतात, ” जीवनाचे सर्व मार्ग जर तुझ्यापाशी येतात व तुझ्यापासून सुरू होतात तर आता माझ्या जीवनाचा मार्ग मला अशा ठिकाणी घेऊन आला आहे की मला पुढचा मार्गच दिसत नाही. म्हणून तू मला मार्ग दाखव जेणेकरून मी माझ्या देशसेवेला अंतरणार नाही. यासाठी मी तुझ्या घराचे बंद दार ठोठावतो आहे. तू दार उघडतच नाहीस म्हणून मी निरनिराळ्या मार्गांनी जाऊन दुसरे पर्याय शोधून पाहिले पण सगळे मार्ग शेवटी तुझ्या बंद दाराशीच येतात. तू तुझे दार उघडत नाहीस, दुसरे घर बांधू देत नाहीस म्हणजे तू सोडून दुसरं कोणी मला या परिस्थितीतून बाहेर काढू शकेल अशी शक्यता तूच निर्माण केली नाहीस वा करू दिली नाहीस म्हणून मी पुनःपुन्हा तुझेच दार ठोठावत आहे व ठोठावत राहेन” असं सावरकर त्या अज्ञात शक्तीला ठणकावून सांगत आहेत.
☆ मानुष हौं तो वही रसखानि – भाग २ ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆
कृष्णभक्त रसखान यांच्या ‘सवैये’चा काव्यानुभव
(काही जाणकारांच्या मतानुसार रसखान यांचे काव्य इतके ‘रसमय’ आहे की ते त्यांना सूरदास या प्रसिद्ध कृष्णभक्त कवीच्याच श्रेणीत नेऊन ठेवतात.)
सवैय्या
आता सवैय्या म्हणजे काय हे बघू या मंडळी! सवैया एक छन्द (वृत्त) आहे. चार ओळी (प्रत्येक ओळीत २२-२६ शब्द) अशा या छंदांना समूह रूपात हिंदीत ‘सवैया’ असे परंपरेने म्हणतात. रसखान यांचे सवैये फार प्रसिद्ध आहेत. निम्नलिखित कविता ‘मानुष हौं तो वही रसखानि’ ही त्यांच्या कृष्णभक्तीचे सुंदर उदाहरण आहे. यात विविध प्रकारे कवी असे सांगतो की मला कृष्णाशिवाय काही नको. त्यांच्या साऱ्या कवितांचा आत्मा कृष्णलीला हाच आहे. कृष्णाची काठी व कांबळे यांवर आठ सिद्धी व नऊ निधींचे वैभवही ओवाळून टाकावे, अशा अलौकिक शब्दांत कवीने आपली कृष्णभक्ती प्रकट केली आहे. आता रसखान यांच्या या प्रसिद्ध कवितेचा आस्वाद घेऊ या. यांतील कांही मोजक्याच सवैयांचा अर्थ समजून घेऊ, कारण कविता रसपूर्ण तर आहे पण बरीच मोठी आहे. हे रसग्रहण करतांना कवीची कृष्णभक्ती जशीच्या तशी प्रस्तुत करायचा मी पुरेपूर प्रयत्न केला आहे.
“मानुष हौं तो वही रसखानि”
मानुष हौं तो वही रसखानि, बसौं मिलि गोकुल गाँव के ग्वारन।
जो पसु हौं तो कहा बस मेरो, चरौं नित नंद की धेनु मँझारन॥
पाहन हौं तो वही गिरि को, जो धर्यो कर छत्र पुरंदर धारन।
जो खग हौं तो बसेरो करौं मिलि कालिंदीकूल कदम्ब की डारन॥
रसखान ब्रजभूमीशी इतके समरस झालेत की तेथील कृष्णाशी संबंधित प्रत्येक गोष्टीशी त्यांना नाते जोडायचे आहे. कवी वरील सवैयात आपल्या इच्छा व्यक्त करीत म्हणतात, ‘देवा, माणसाच्या जन्माला घालायचे तर गोकुळातल्या एखाद्या गुराख्याच्या किंवा गवळ्याच्या जन्माला घाल, पशूच्या जन्माला घालायचे तर गोकुळातील नंदाच्या घरच्या गाई किंवा पाड्याच्या जन्माला घाल, रोज कान्हा वनात घेऊन जाईल याची ग्यारंटी! अन हो, दगडच व्हायचे तर जो गोवर्धन पर्वत कृष्णाने उचलला ना तिथेच पडून राहू दे मला. त्या पवित्र पर्वताचे छत्र करंगळीवर धारण करून कधी काळी इंद्रदेवाच्या कोपापासून गोकुळातल्या लोकांचे प्राण वाचवले होते त्या गिरीधराने! अरे पक्ष्याच्या जन्माला घातलेस तरी हरकत नाही, मात्र अशी सोय कर बाबा की, मी ब्रजभूमीवर जन्म घेईन अन कालिंदीच्या तटावरील एखाद्या कदंबाच्या फांदीवर आपले घरटे बांधीन. अरे कधी काळी याच कदंबाच्या फांद्यांचे हिंदोळे घेत असतील राधा अन गोपाळकृष्ण! नाही तर याच कदंब वृक्षावर बसून तो कृष्ण मुरली वाजवून गोपींना रिझवीत असेल! असे माझे नशीब असेल का की, जिथे जिथे कृष्णाचा आणि गोपगोपींचा वास होता तिथंच मी पण जन्म घेईन?’
या लकुटी अरु कामरिया पर, राज तिहूँ पुर को तजि डारौं।
आठहुँ सिद्धि, नवों निधि को सुख, नंद की धेनु चराय बिसारौं॥
ए रसखानि जबै इन नैनन ते ब्रज के बन बाग तड़ाग निहारौ।
कोटिक हू कलधौत के धाम, करील के कुंजन ऊपर वारौं॥
वरील सवैयात कवी रसखान यांना श्रीकृष्णाच्या बालपणीच्या वस्तूंचा भारीच मोह पडलाय असे दिसते. त्यांच्यासाठी ते कशा कशाचा त्याग करायला तयार आहेत हे बघा! ते म्हणतात, ‘या गवळ्याची काठी आणि कांबळे मला अतिप्रिय, त्यांच्यावरून त्रिलोकाचे राज्य जरी मिळाले तरी मी ओवाळून टाकीन! नंदाच्या गाई चरावयास घेऊन जायचे सुख मिळणार असेल तर आठ सिद्धी (अणिमा, महिमा, लघिमा, गरिमा, प्राप्ति, प्राकाम्य, इशित्व आणि वशित्व) तसेच नऊ निधी (पद्म निधि, महापद्म निधि, नील निधि, मुकुंद निधि, नंद निधि, मकर निधि, कच्छप निधि, शंख निधि आणि खर्व) यांच्या सुखाचा मी त्याग करू शकतो. मी स्वतःच्या नेत्रांनी ब्रजभूमीतील वने, उपवने, उद्यान आणि तडाग हे सर्व जीवनभर बघत राहून ते नेत्रात साठवीन. ब्रजभूमीतील काटेदार वृक्षवेलींकरता कोटी कोटी सुवर्ण महाल अर्पण करावयास मी आनंदाने तयार होईन.’
सेस गनेस महेस दिनेस, सुरेसहु जाहि निरंतर गावै।
जाहि अनादि अनंत अखण्ड, अछेद अभेद सुबेद बतावैं॥
नारद से सुक व्यास रहैं पचि हारे तऊ पुनि पार न पावैं।
ताहि अहीर की छोहरियाँ, छछिया भरि छाछ पै नाच नचावैं॥
कवी वरील ओळींमध्ये म्हणतात, ‘शेष (नाग), गणेश, महेश (शिव), दिनेश (सूर्य) आणि सुरेश (इंद्र) हे देव त्याचे (कृष्णाचे) निरंतर ध्यान करतात, त्याचे आकलन करू न शकलेले वेद त्याचे गुणगान असे गातात ‘तो अनादी, अनंत, अखंड, अछेद (छिद्र नसलेला) आणि अभेद्य, आहे.’ नारद मुनी, शुक मुनी, वेदव्यास सारखे गाढे ज्ञानी ऋषी मुनी ज्याच्या नावाचा सतत जप करतात, तरीही त्याचा भेद जाणू शकत नाहीत, असा परात्पर परब्रह्म असलेल्या या गोकुळातील बाळकृष्णाला या गवळणी (अहीर की छोरियाँ) ताकाचे भांडे (छछिया-ताक ठेवण्याचे मातीचे लहान भांडे) दाखवत नाचायला लावतात, कधी पैंजण घालायला लावतात तर कधी घागरा चोळी!’ जगाला नाचवणारा हा भगवान कृष्ण! त्याच्या लीला अपरंपार! आणि या जगदीश्वराला आपल्या मनाला वाटेल तसे नाचवणाऱ्या या गवळणींचे भाग्य किती थोर बरे! त्याचे बालरूप इतके मनमोहक आणि सुजाण असूनही अजाण गोपींसाठी हा अशा लीला करतो.
(असे म्हणतात की स्त्रीरूप घेऊन भगवान विष्णूंशी एकरूप होण्यासाठी देव आणि ऋषी मुनी यांनी गोपिकांचे रूप घेतले. पण गोपिका झाल्यावर ते आपले मूळ रूप विसरले आणि भोळ्या भाबड्या गोपिकांच्या रूपात त्यांना कृष्णाचा असा सहवास लाभला! खरे काय अन खोटे काय त्या पूर्णब्रह्म कृष्णालाच माहित, एक मात्र सत्य, जगाला नाचवणारा हा भगवान कृष्ण गोपींसाठी नृत्य करायला सदैव तयार असायचा, फक्त लोण्याचा गोळा अन वाडगाभर ताक द्यायला लागायचं!)
धुरि भरे अति सोहत स्याम जू, तैसी बनी सिर सुंदर चोटी।
काग के भाग बड़े सजनी, हरि हाथ सों लै गयो माखन रोटी॥
वरील सवैयात एक गोपी आपल्या सखीजवळ कृष्णाच्या सुंदर रूपाचे वर्णन करीत म्हणते, “सखे, अगं, धुळीत खेळून खेळून कृष्णाचं सगळं अंग धुळीने माखलय, कित्ती शोभून दिसतोय नाही हा असा! आणि त्याचे कुरळे केस बघ कसे सुंदर बांधले आहेत,, एक चोटी (चुट्टी) शिरावर शोभून दिसतेय (द्वारकेत गेल्यानंतर सोन्याचा मुकुट आला तरी ही बालपणीची शेंडी काहीं न्यारीच!) अंगणात खेळता खेळता खाणे अन खाता खाता खेळणे हे तर हृदयंगम दृश्य, खातो काय तर पोळी अन लोणी (माखन रोटी). असे धावत पळत अन पडत असतांना पायातील चाळ (पैंजण) छुनून छुनून वाजताहेत, ते नादब्रह्म म्हणजे सप्तसुरांपलीकडले, अर्थात आठवे!!!, आठवावा आठव्याचा (कृष्णाचा) आठवा स्वर, अर्थात त्याच्या पैंजणाची झंकार! (रुमझुम रुमझुम चाल तिहारी, काहे भयी मतवारी, हम तो बस बलिहारी, बलिहारी!!!) त्याने पीतवर्णाची लंगोट घातलेली आहे (मोठे झाल्यावर पितांबर, धन्य हो, किसनकान्हा!). या कृष्णाच्या मनमोहक आणि मनभावन स्वरूपाने सगळ्यांना वेड लावलच आहे, त्याच्या सौंदर्यशोभेपुढे प्रत्यक्ष कामदेव आणि कलानिधी चंद्र देखील आपल्या करोडो सुंदर रूपांना ओवाळून टाकीत आहेत. अगं सखये, जरा बघ तरी, त्या मेल्या कावळ्याचे भाग्य कसे फळफळलेय ते, चक्क कृष्णाच्या हातातील ‘माखन-रोटी’ वर झपाटून डल्ला मारला आणि ती घेऊन कसा उडून गेला बघ!”
कानन दै अँगुरी रहिहौं, जबही मुरली धुनि मंद बजै है।
माई री वा मुख की मुसकानि, सम्हारि न जैहै, न जैहै, न जैहै॥
रसखान वरील ओळींमध्ये गोपी कृष्णाच्या प्रेमात किती वेड्या झालेल्या आहेत ते सांगतात. एक गोपी आपल्या सखीला म्हणतेय, “अगं सखये, कृष्णाची मंद मंद सुरेल नादमधुर बासरी वाजते ना तेव्हा, माझ्या कानात कोणी बोटे घालावी, अर्थात मला ना त्याच्या बासरीची तान मुळी ऐकायचीच नाही बाई! तो ना माझ्या घराच्या वरच्या मजल्यावर चढून येईल आणि मुद्दामच माझ्या मनाला मोहून घेणाऱ्या ताना घेत गायी चरायला नेत असता गवळी म्हणतात ती गाणी (गौचारण) गात बसेल. पण मी ना सर्व ब्रजवासीयांना ओरडून ओरडून सांगेन, मला भलेही काहीही अन कितीही समजावून सांगून बघा, पण हे सखी, या श्यामलतनु कृष्णाच्या मुखावरील ते मंद, मधुर स्मितहास्य तर माझ्या मनाचा ताबा घेतंय! मला माझं मनच आटोक्यात ठेवता येत नाहीय. तो माझ्या हृदयकमलाभोवती भ्रमरासारखा गोड गुंजारव अन प्रेमालाप करीत फिरतोय! अर्थात् मी कृष्णाच्या प्रेमात अगदी आकंठ बुडालेय. मी इतकी व्याकुळ आणि उन्मत्त झाले आहे की काय सांगू अन कसं सांगू! मी सगळी लाज सोडून श्रीकृष्णाकडे धाव घेत आहे.”
मोर-पखा सिर ऊपर राखिहौं गुंज की माला गरे पहिरौंगी।
ओढि पितंबर लै लकुटी वन गोधन ग्वारनि संग फिरौंगी॥
भाव तो वोहि मेरो रसखानि सो तेरे कहे सब स्वाँग करौंगी।
या मुरली मुरलीधर की अधरान धरी अधरा न धरौंगी॥
कवीने या सवैयात गोपीचे कृष्णावरील आगळेवेगळे प्रेम प्रकट केले आहे. कृष्णाच्या वस्तूंना धारण करण्याची तिची कशी तयारी आहे बघा. एक गोपी आपल्या सखीला म्हणतेय, “अगं सखये, मी ना आपल्या शिरावर (कृष्णासारखाच) मोरपंखाचा मुकुट धारण करेन. गुंजांची माळ गळ्यात घालीन, झालच तर पीत वस्त्रे परिधान करून हातात काठी घेऊन आणि गवळण बनून वनावनात गायी चरायला घेऊन जाईन अन त्यांच्या मागे फिरत फिरत छान रखवाली करीन. कृष्ण तर मला इतका परमप्रिय आहे, की त्याच्यासाठी मी वाट्टेल ते करीन, त्याला प्राप्त करायला तू सांगशील ते सोंग घेईन. पण एक लक्षात ठेव बाई, कृष्णाची जी मुरली आहे ना, जिला तो अधरात धरून ठेवतो, तिला मात्र मी माझ्या अधरात कध्धी म्हणून कध्धी धरायची नाही हं!” (सवत आहे ना!)
मोरपखा मुरली बनमाल, लख्यौ हिय मै हियरा उमह्यो री।
ता दिन तें इन बैरिन कों, कहि कौन न बोलकुबोल सह्यो री॥
अब तौ रसखान सनेह लग्यौ, कौउ एक कह्यो कोउ लाख कह्यो री।
और सो रंग रह्यो न रह्यो, इक रंग रंगीले सो रंग रह्यो री।
गोपिका म्हणतात, ‘शिरावर मोरपंख, ओठांत मुरली आणि गळ्यात वनमाळा घातलेल्या कृष्णाला बघत राहिल्याने मन वाऱ्यावर डोलणाऱ्या कमलपुष्पासारखं डुलतय. माझ्या अशा प्रेममग्न अवस्थेत कोणी वैरीण जरी उलटे सुलटे बोलली तरी सहन केल्या जातंय! रसखान म्हणतात, जेव्हा लावण्याचा गाभा अशा कृष्णाशी इतके स्नेहबंध जुळले आहेत की, कोणी एक म्हणू दे किंवा कोणी लाख वेळा टोकले तरी, आता इतर कुठलाच रंग असो व नसो, त्या सावळ्या कृष्णसख्याच्या रंगातच रंगून राहायचे आहे!’ जाता जाता याच अर्थाचे माणिकबाईंचे गाणे आठवले, ‘त्या सावळ्या तनुचे मज लागले पिसे ग, न कळे मनास आता त्या आवरू कसे ग!’
ज्याच्या गळ्यात वैजयंतीमाला शोभायमान होते अशा कुंजबिहारी, गिरधरकृष्ण मुरारी, भगवान श्रीकृष्णाच्या चरणी ही शब्द कुसुमांजली अर्पित करते!
काव्यानंद या सदरात मराठी भाषेतील कवितेचे रसग्रहण अपेक्षित आहे.आज आम्ही अपवादात्मक बाब म्हणून हिंदी भाषेतील काव्य रचनेचे रसग्रहण प्रकाशित करीत आहोत.आपला अंक तिनही भाषेत प्रकाशित होत असल्यामुळे त्या त्या भाषेतील साहित्य प्रकाशित होईल.यापुढील काळात मराठी अंकासाठी अन्य भाषेतील साहित्य पाठवले जाणार नाही याची कृपया दक्षता घ्यावी, ही विनंती.
संपादक मंडळ (ई-अभिव्यक्ती -मराठी)
काव्यानंद
☆ मानुष हौं तो वही रसखानि – भाग १ ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆
कृष्णभक्त रसखान यांच्या ‘सवैये’चा काव्यानुभव
प्रसिद्ध कृष्णभक्त रसखान हे ब्रज भाषेचे कवी! वल्लभाचार्यांपासून सुरु झालेला संप्रदाय म्हणजे वल्लभ संप्रदाय. जेव्हापासून गोकुळ हे वल्लभ संप्रदायाचे केंद्र बनले, तेव्हापासून ब्रजभाषेत कृष्णावरील साहित्य लिहिण्यास सुरुवात झाली. या प्रभावामुळे ब्रजची बोली भाषा (मथुरा, गोकुळ व वृंदावन येथील) एक प्रतिष्ठित साहित्यिक भाषा बनली. सूरदास आणि रसखान यांच्या कृष्णभक्तीने रसरसलेले मधुर ब्रज भाषेतील काव्यप्रकार अतिशय सुंदर भावानुभव देतात. ‘कृष्णलीला’ हा त्यांच्या काव्याचा प्रमुख विषय. त्याची खोली अनुभवायची तर रसखान यांचे काव्यवाचन हाच एकमेव उपाय. त्यातीलच भक्तिप्रेम रसाने परिपूर्ण अशा त्यांच्या कांही प्रसिद्ध ‘सवैये’ या काव्यप्रकाराचा या लेखात समावेश करीत त्यांचे रसग्रहण करण्याचा मी प्रयत्न केला आहे.
सय्यद इब्राहिम खान उर्फ रसखान यांचा जन्म काबुल येथे (१५७८) झाला तर मृत्यू वृंदावन येथे झाला (१६२८). ते प्रसिद्ध भारतीय सुफी कवी आणि कृष्णाचे परम भक्त होते! आपण बादशाही वंशातील आहोत, असा कवीने स्वतःचा उल्लेख केला आहे. त्यावरून त्यांचे बालपण चांगल्या स्थितीत गेले असावे, असे समजल्या जाते. भागवताचा फारसी अनुवाद वाचून त्यांच्या हृदयात श्रीकृष्णाबद्दल भक्ती उत्पन्न झाली. या संदर्भात अनेक आख्यायिका प्रसिद्ध आहेत. शेवटी तात्पर्य इतकेच, की त्यांना अनेक प्रसंगामुळे कृष्णभक्तीची ओढ लागली. वल्लभाचार्यांचे पुत्र विठ्ठलनाथ यांनी कृष्णभक्तीची दीक्षा दिल्यानंतर मुसलमान असूनही त्यांनी वैष्णव भक्ताप्रमाणे जीवन व्यतीत केले.
त्यांनी प्रेमवाटिका हे काव्य १६ व्या शतकात रचले आणि ते वृंदावन येथे खूपच प्रसिद्ध झाले. बावन दोह्यांच्या या काव्यात प्रेमाची महती वर्णिली आहे. ‘सुजान रसखान’ या केवळ १२९ स्फुट पदांच्या संग्रहाचा नायक आहे ‘सुजान रसखान’ चा प्रिय, आपल्या मुरलीने गोपींना मोहित करणारा श्रीकृष्ण! यातील ‘कवित्तसवैय्ये’ अतिशय लोकप्रिय आहेत. ‘ऐकवा एखादी कविता’ या अर्थी ‘सुनाओ कोई रसखान’ असा वाक्यप्रयोगच या संदर्भात केला जात असे. ब्रजभाषेत कविता रचणाऱ्या या कवीचा भागवत आणि अन्य संस्कृत ग्रंथांशी चांगलाच परिचय होता असे दिसून आले आहे. आपल्या काव्यात रसखान यांनी या पौराणिक संदर्भांचे उल्लेख केलेले आहेत. त्याच्या कवितेत अरबी, फारसी आणि अपभ्रंश भाषांतील शब्दांचाही विपुल वापर आढळून येतो. त्यांची भाषा साधी व सरळ असूनही सरस आणि समृद्ध आहे. त्यांनी दोहा, कवित्त, घनाक्षरी व सवैय्या छंदांचा (वृत्त) वापर अधिक प्रमाणात केला. आपल्या रचनांतून कृष्णाचे बालपण, त्याच्या विविध लीलांचे रसपूर्ण मनोज्ञ घडवणारा कवी हाच रसखान यांचा सर्वात महान परिचय! काही जाणकारांच्या मतानुसार रसखान यांचे काव्य इतके ‘रसमय’ आहे की ते त्यांना सूरदास या प्रसिद्ध कृष्णभक्त कवीच्याच श्रेणीत नेऊन ठेवतात.
जगाचे काही नियम असतात. काही विशिष्ट शिष्टाचार, विचारांच्या चौकटी असतात. या चौकटीतच सर्वसामान्य माणूस वावरत असतो, समाजमान्य होईल असे वागत असतो. या चौकटींच्या पलीकडे जात स्वतःच्या मनाप्रमाणे, स्वतःच्या आनंदासाठी जगणाऱ्याला ‘कलंदर’ म्हणतात. ” त्याचं सगळं जगावेगळंच असतं ” असा ठपकाही त्याच्यावर येतो. अशाच एका मनस्वी कलाकाराचे मनोगत म्हणजे डॉ. निशिकांत श्रोत्री लिखित ‘ वेडा कलाकार ‘ ही कविता. आज आपण तिचा रसास्वाद घेणार आहोत.
मी एक कलाकार आहे. कवी आहे. मनाने खूप दिलदार आहे.पण मी कलंदर म्हणा, मनस्वी म्हणा, म्हणजे अगदी बिनधास्त जगणारा, स्वतःच्या आनंदासाठी जगणारा स्वाभिमानी, समाधानी माणूस आहे.
ही कविता प्रथम पुरूषी एकवचनात लिहिली आहे हे याचे खास वैशिष्ट्य आहे. त्यामुळे कवी आपले मनोगत सरळपणे, प्रांजळपणे मांडतो.
नाही जमलं तोलायला कधी
घेतलेलं व्रत चांदीच्या तराजूतून
शब्द, सूर, रंग, इतकच काय
माणसाचं आयुष्य देखील मापायचं असतं
सोन्याच्या मापाने
कधी उमगलंच नाही मला
मुक्तछंदातली ही कविता संपूर्णपणे रूपकात्मक आहे. चांदीचा तराजू आणि सोन्याचे माप ही इथे रूपके आहेत. कवी म्हणतो, ” एखादे व्रत घेतल्यासारखे मी माझ्या मनाप्रमाणे जगताना फक्त समाधान मिळविले कोणत्याही गोष्टींपासून तोटा काय आहे फायदा किती आहे याचा कधी विचारच केला नाही. म्हणजे त्या गोष्टींना चांदीच्या तराजूत तोलले नाही. त्यातून मिळालेले समाधान हीच माझी मिळकत आहे.
जग खूप व्यवहारी आहे. लोकांचे यशाचे मापदंड वेगळे आहेत. त्यामुळेच साहित्य, संगीत, चित्रकला यासारख्या गोष्टींचेच फक्त नव्हे तर अगदी माणसांचे पण मोजमाप केले जाते, तेही सोन्याच्या मापाने. म्हणजे सगळे काही पैशातच मोजले जाते. हा व्यवहार मला कधी जमलाच नाही, समजलाच नाही. कारण मला पैशांपेक्षा या गोष्टीतून मिळणारे समाधान खूप मोलाचे वाटते.”
कवीच्या या मनस्वी वागण्याने जगाने छांदिष्ट, विक्षिप्त अगदी वेडा अशी विशेषणे त्याला दिली. पण कवीने कधी त्याची फिकीर केली नाही.
श्रीखंड चाटलं, जामून खाल्ला
भुरके घेतले बासुंदीचे मनसोक्त
अगदी मनमुराद आस्वाद घेतला भेळेचाही
त्यांच्या चवीतच रमून गेलो
पर्वा नव्हती खातोय कसल्या चमच्याने याची
कधी बोट, कधी द्रोण तर कधी पुठ्ठ्याचे
तुकडे सुद्धा
मी प्रत्येक गोष्ट आनंदासाठी, समाधानासाठीच केल्याने अनेक सुखाचे, यशाचे, आनंदाचे चांगले अनुभव घेतले. असे क्षण मनापासून अनुभवले. त्यामध्ये अगदी मनापासून रममाण झालो. यामध्ये मला समाधान मिळवणे हे साध्यच खूप महत्त्वाचे होते. ते मिळवण्यासाठी कोणत्या साधनांचा, कोणत्या गोष्टींचा वापर केला याला माझ्या दृष्टीने फारसे महत्त्व नव्हते.
इथे पक्वान्ने, भेळ, द्रोण, पुठ्ठ्याचा तुकडा ही रूपकेच आहेत. कवीने आपली मनोधारणा जपताना, त्याप्रमाणेच वागताना कधी अगदी श्रीखंड, गुलाबजाम, बासुंदी ही मिष्ठान्ने तर कधी अगदी चटकदार भेळेचाही आस्वाद घेतला. म्हणजे आपल्या जगण्यातून भरपूर आनंद,सुखाचे क्षण, अतीव समाधान मिळवले. त्याच वेळी त्यासाठी काय काय करावे लागले, किती कष्ट करावे लागले, कोणत्या मार्गांचा अवलंब करावा लागला याची कधी पर्वा केली नाही. म्हणजे या पक्वान्नांच्या आस्वादासाठी चमचा, बोट, द्रोण, अगदी पुठ्ठ्याचा तुकडाही कधी वापर करावा लागला तरी त्याची फिकीर केली नाही. फक्त पदार्थांचा आस्वाद घेणे हीच गोष्ट महत्त्वाची होती. त्यामुळे त्यासाठीची साधने गौण मानली.
अन अचानक अनपेक्षितपणे मिळाला
हातात एक सोन्याचा चमचा
हरकून गेलो, मोहून गेलो
तोंडात घालताना एकेक घास
काय खातोय जाण नव्हती
सोन्याच्या चमच्याने खातोय
हीच धुंदी होती
मी आयुष्यात पक्वांन्नांचा आस्वाद मनसोक्तपणे घेतला. तेव्हा ते खायला कोणत्या साधनांचा वापर केला याला फारसे महत्त्व दिले नाही. तर आस्वाद घेणे हेच उद्दिष्ट होते. पण अचानकपणे ध्यानीमनी नसताना मला सोन्याचा चमचा मिळाला. त्यामुळे मी अगदी हरखून गेलो. मती गुंग झाली. त्या नादात आता काय खातोय याचे भानही मला नव्हते. फक्त सोन्याच्या चमच्याने खातोय याचीच धुंदी मला चढली होती.
इथे सोन्याचा चमचा हे खूपच महत्त्वाचे रूपक आहे. ते म्हणजे लक्ष्मीचे वरदान, भरपूर कमावण्याचा मार्ग. हे आजच्या वास्तवाचे, प्रगतीचे रूपक आहे.आजकाल अगदी भरपूर पगाराच्या नोकऱ्या मिळतात. सांपत्तिक स्थिती खूप सुधारते. त्या पैशांचा मोहपाश आवळत जातो. काम-काळ-वेळेचे गणित चुकत जाते. पैसा भरपूर कमावतात. पण त्याचा आस्वाद घ्यायला हाताशी सवड नसते. म्हणजेच हातात सोन्याचा चमचा आहे पण त्याच्या धुंदीपायी आपण काय खातोय हेच समजतही नाही. फक्त खाणे होते अन् अनुभूती शून्य.
धुंदी वाढतच होती
पण पोट भरल्याचं काही जाणवत नव्हतं
का ?
लक्षात आलं
तोंडात न श्रीखंड, न बासुंदी, न भेळ
नुसता चमचा चघळतोय
………सोन्याचा………
ही धुंदी अशी वाढतच होती. पण पोट भरल्याचं मला जाणवत नव्हतं. असं का होतंय ? असा विचार केला आणि माझ्या लक्षात आलं की, माझ्या तोंडात ना पक्वान्न आहे ना भेळ. तर मी नुसताच चमचा चघळतोय. तोही सोन्याचा चमचा.
इथे कवितेचा क्लायमॅक्स आहे. पैसा मिळवणे आणि पैशाचा मोह, हव्यास या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. अती पैशाने संवेदना बोथट होतात. एक प्रकारची पैशाची धुंदी मनाला ग्रासून टाकते. त्यामुळे पैशाचा आनंद घेणे, उपभोग घेणे, त्यातून मन:स्वास्थ्य मिळवणे या गोष्टी होतच नाहीत. आपण फक्त त्या पैशाच्या हातातले खेळणे बनून त्याच्या मागे धावत राहतो. म्हणजेच तो सोन्याचा चमचा नुसताच चघळत रहातो आणि पोट काही भरत नाही.
या कवितेत कवीने रूपकांचा फार सुंदर वापर केला आहे. चांदीचा तराजू, सोन्याचे माप, श्रीखंड, जामुन, बासुंदी, भेळ, बोट, द्रोण, पुठ्ठ्याचा तुकडा, सोन्याचा चमचा या रूपकां मधून कवींने आजकालच्या जीवन पद्धतीचे फार अचूक वर्णन केलेले आहे. रूपकांमुळे कमीत कमी शब्दात सखोल वर्णन केले गेलेले आहे. जगण्यासाठी नेमके किती हवे, त्यातून मिळणारे समाधान जपायचे का पैशाची हाव धरून त्यामागे धावायचे आणि मग त्यापायी जगायचेच राहून जाते हे भीषण वास्तव आहे.
असे हे एका मनस्वी, कलंदर कलाकाराचे मनोगत सांगताना त्यातून कवीने फार मोठा संदेश दिला आहे. तो म्हणजे पैसा मिळवणे हे जितके महत्त्वाचे आहे त्यापेक्षा त्या पैशाचा योग्य उपभोग घेणे महत्त्वाचे आहे. त्यातून मिळणारे समाधान हे खरे लाखमोलाचे असते. आपल्या कृती-उक्तीतून मिळणारे समाधान हेच आपले खरे वैभव असते हीच गोष्ट कवी डॉ. निशिकांत श्रोत्री यांच्या ‘वेडा कलाकार ‘या कवितेतून आपल्याला सांगतात.
☆ अखिल हिंदु विजयध्वज गीत… स्व. वि. दा. सावरकर ☆ रसग्रहण – सुश्री शोभना आगाशे ☆
☆ अखिल हिंदु विजयध्वज गीत…. स्व. वि. दा. सावरकर ☆
अखिल – हिंदु – विजय – ध्वज हा उभवुया पुन्हा ॥ध्रु॥
या ध्वजासची त्या काली । रोविती पराक्रमशाली
रामचंद्र लंकेवरती । वधुनि रावणा ॥१॥
करित जैं सिकंदर स्वारी । चंद्रगुप्त ग्रीकां मारी
हिंदुकुश – शिखरी चढला । जिंकुनि रणा ॥२॥
रक्षणी ध्वजाला ह्याची । शालीवाहनाने साची
उडविली शकांची शकले । समरि त्या क्षणा ॥३॥
हाणिले हुसकिता जेथे । हूणांसि विक्रमादित्ये
हाच घुमवि मंदसरच्या । त्या रणांगणा ॥४॥
जइं जइं हिंदू सम्राटे । अश्वमेध केले मोठे
करित पुढती गेला हाचि । विजय घोषणा ॥५॥
उगवुनि सूड हिंदूंचा । मद मर्दुनि मुस्लीमांचा
शिवराय रायगडी करिती । वीरपूजना ॥६॥
ध्वज हाच धरुनि दिल्लीला । वीरबाहु भाऊ गेला
मुसलमीन तख्ता फोडी । हाणुनि घणा॥७॥
पुढती नेम कांही ढळला । ध्वज जरी करातुन गळला
उचलुया पुनरपि प्राणा । लावुनि पणा ॥८॥
(आंग्ल दैत्य तोचि आला । सिंधुतूनि घालुनि घाला
बुडविला सिंधुतचि त्याही । करुनि कंदना ॥८॥)
– कवी – वि. दा. सावरकर
☆ रसग्रहण – सुश्री शोभना आगाशे ☆
भारत पारतंत्र्यात असताना १९३८ साली सावरकरांनी ही कविता लिहिली होती. त्यावेळी त्या कवितेत पहिली आठ कडवी होती. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर १९५१ साली या कवितेतलं आठवं कडवं बदलून, त्याजागी सावरकरांनी वर कंसात दिलेलं आठवं कडवं जोडलं.
या देशातल्या पौराणिक व ऐतिहासिक वीरांनी परकीय आक्रमणाला कसं तोंड दिलं, शत्रूला पळवून लावलं आणि हिंदूंचा विजयध्वज कसा फडकत ठेवला याचं वीरश्रीपूर्ण वर्णन या कवितेत केलेलं आहे. कवितेतले जोशपूर्ण शब्द, काळजाला भिडणारे प्रसंग, प्रत्येक कडव्याच्या शेवटी येणारे, यमक साधणारे खणखणीत शब्द, भारतीयांची छाती अभिमानाने फुगविणारे इतिहासातले दाखले देऊन हिंदुंच्या वीरश्रीला साद घालणारी, त्यांचा आत्मविश्वास वाढविणारी विजयाची वर्णने अपेक्षित परिणाम नक्कीच साधतात, रोमांचित करतात. सावरकर या कवितेत, प्रभू रामचंद्रांनी केलेला रावणवध, सम्राट चंद्रगुप्ताने सिकंदराचा पराभव करून त्याचा सेनापती सेल्युकसला, त्याच्या ग्रीक सैन्यासह हिंदुकुश* पर्वतापर्यंत घ्यायला लावलेली माघार, शक व हूणांचा* शालिवाहन व विक्रमादित्य* यांनी केलेला पराभव, मुस्लीम पातशाही नेस्तनाबूत करण्यासाठी शिवाजी महाराजांनी उभारलेला स्वातंत्र्यलढा व मिळवलेले विजय, सदाशिवभाऊ पेशव्यांच्या नेतृत्वाखाली दक्षिणेची मोहिम फत्ते केल्यानंतर उत्तरेच्या मोहिमेत २ ऑगस्ट १७६० रोजी मराठ्यांनी जिंकलेलं दिल्लीचं तख्त* या व अशा ओजस्वी इतिहासाची हिंदु बांधवांना आठवण करून देऊन, इंग्रजी सत्तेविरुद्ध लढण्यासाठी व हिंदू विजयध्वज फडकविण्यासाठी कवी या कवितेद्वारे हिंदूंना उद्युक्त करीत आहेत.
*हिंदुकुश पर्वत = हिमालयीन पर्वत रांगांचा अफगाणिस्तान पासून ताजिकिस्तान पर्यंत पसरलेला पश्चिमेकडील भाग.
*शक व हूण = पूर्व/मध्य आशियातील रानटी, लुटारू टोळ्या
*शालिवाहन = गौतमीपुत्र सातवाहन/ सालाहन/ सालीहन ( इ स ७२ ते ९५) म्हणजेच शकारी किंवा शककर्ता शालीवाहन. शकांवरील विजयाचे (इ.स.७८) स्मरण म्हणूनच त्याने चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून सुरू होणारे शालिवाहन शक १९४५ वर्षांपूर्वी सुरू केले. हे युद्ध आताच्या नाशिक परिसरात झालं, कारण नाशिकला लागूनच गुजरात व राजस्थान इथं शक राजा नहापानने आपली सत्ता प्रस्थापित केली होती.. याविषयीचा शिलालेख नाशिक येथे उपलब्ध आहे.
*विक्रमादित्य = दुसर्या चंद्गुप्ताचा नातू स्कंदगुप्त. याने देखिल आपल्या आजोबांप्रमाणे विक्रमादित्य हे बिरुद धारण केले होते.
*मंदसर(मंदोसर/मंदसौर)= मेवाड व माळवा यांच्या बाॅर्डरवरील शहर. येथे अफूची शेती होते. हे रावणपत्नी मंदोदरीचं माहेर मानलं जातं. येथे झालेल्या युद्धात विक्रमादित्याने हूणांचा दारूण पराभव केला. त्यानंतर ४०/५० वर्षे हूणांनी भारतावर आक्रमण केले नाही.
*दोन ऑगस्ट १७६० रोजी दिल्ली जिंकल्यानंतर दोन महिन्यांनी मराठ्यांनी १० ऑक्टोबर रोजी शाह आलम या मुघल वंशजाला दिल्लीच्या गादीवर बसवलं.
‘आई’ हे आपले परमदैवत. आई म्हटले की आठवतो तो तिचा प्रेमळ उबदार स्पर्श, तिने भरविलेला मऊ दुधभात आणि तिने अंगाई म्हणत आपल्याला निजवणे. तिच्या प्रेमळ आवाजाने आपल्याला छान झोप येई. देव देवतांच्या जन्मोत्सवाचे वेळी जे पाळणे म्हटले जातात त्याच पारंपारिक चालीवरती डॉ. निशिकांत श्रोत्री सरांनी ही ‘अंगाई’ लिहिलेली आहे.
☆ अंगाई… कवी: डाॅ.निशिकांत श्रोत्री ☆
निज निज निज बाळा
पाळणा तुजसाठी झुलविला
करी गाई गाई
तव आई गाई तुज अंगाई
निज निज निज बाळा ||ध्रु||
खेळ किती रंगे
चिऊ काऊ भू भू माऊ संगे
रांगशी दुडुदुडू
सवंगडी सारे ते प्रेमाने
तुजवरती जीव
थकलाशी लाव पापणी डोळा
निज निज निज बाळा ||१||
ज्योती त्या विझल्या
निरांजनी शांतवुनीया गेल्या
तुजला लडिवाळा
निजवाया येई मिट्ट काजोळा
मनमोहन बाळा
निद्रेचा सगळा का धांडोळा
निज निज निज बाळा ||२||
चांदोबा आला
घेउनिया तारका नि चांदण्या
चांदणे तुजला
अंगाई गाई निजवायाला
डोळा पेंगुळला
मिटुनीया पापणीच्या पंखाला
निज निज निज बाळा ||३||
पाडसे निजली
हम्मेच्या शेजारी पहुडली
दूध पाजविले
कपिलेने त्यांना रे निजविले
तया ना झोपाळा
तरी ही ती शांत कशी झोपली
निज निज निज बाळा ||४||
जादुई दुलई
घेउनी तुज निजवायला आली
तव सखी परिराणी
झोकाळा देई तुज झुलवूनी
वाजवी ना वाळा
नीज अता मिटुनी घेई डोळा
निज निज निज बाळा ||५||
शांत तरूतळा
विसावुनी पाचोळा ही निजला
वारा ही शमला
सैरभरा घोंगावूनी थकला
शिणविसी का डोळा
झुलवीते तुज देउनी हिंदोळा
निज निज निज बाळा ||६||
हे कुलभूषणा
नाव करी दिगंत दाही दिशांना
तव रूप छान
आम्हाला तुझा किती अभिमान
तू अमुचा जीव
श्रीराम कृष्णसखा तू देव
निज निज निज बाळा ||७||
– डॉ. निशिकान्त श्रोत्री
☆ अंगाई…राजकपूर — कवी — डॉ. निशिकान्त श्रोत्री ☆ रसग्रहण – सौ. ज्योत्स्ना तानवडे ☆
निज निज निज बाळा
पाळणा तुजसाठी झुलविला
करी गाई गाई
तव आई गाई तुज अंगाई
निज निज निज बाळा ||ध्रु||
अरे सोनुल्या, माझ्या बाळा, आता गाई गाई कर. शांत झोपी जा. तुझ्यासाठी मी पाळणा झुलवीते आहे. मी तुझी आई तुला अंगाई गाते आहे. आता गाई गाई कर. अगदी मृदू आवाजात आई आपल्या तान्हुल्याला हे म्हणते आहे. या शब्दांमध्ये निज निज, आई, गाई, अंगाई या शब्दांमध्ये छान अनुप्रास साधल्याने या अंगाईला छान लय प्राप्त झाली आहे.
खेळ किती रंगे
चिऊ काऊ भू भू माऊ संगे
रांगशी दुडूदुडू
सवंगडी सारे ते प्रेमाने
तुजवरती जीव
थकलासी लाव पापणी डोळा
निज निज निज बाळा ||१||
अरे छकुल्या, चिऊ, काऊ, माऊ, भू भू हे तुझे सवंगडी आहेत. त्यांच्याबरोबर तुझे खेळ किती रंगतात. तुझे हे खेळगडी पण तुझ्यावर किती माया करतात. त्यांच्याशी खेळताना तू घरभर कसा दुडूदुडू रांगत असतोस. खेळून खेळून तू आता दमला आहेस. तेव्हा आता तुझ्या पापण्या मिटू देत. आता छान गाई गाई कर.
बाळाचे जेवण तर चिऊ-काऊ शिवाय होतच नाही. आजूबाजूला पळणाऱ्या माऊ, भू भू बरोबर बाळ पण भरभर रांगत असते. अगदी बालवयापासून या प्राणी मित्रांशी त्याचे मैत्र जुळत जाते. इथे वापरलेल्या ‘दुडूदुडू’ शब्दाने रांगणारे बाळ आपल्याला डोळ्यासमोर दिसू लागते. चिऊ, काऊ, माऊ, भू भू हे शब्द बालकांच्या बोलीभाषेत आहेत.बाळाच्या बोबड्या बोलीत ते शब्द आणखीनच मोहक वाटतात. या शब्दात साधलेला अनुप्रास शब्दांची रंगत आणखीन वाढवतो.
ज्योती त्या विझल्या
निरांजनी शांतवुनीया गेल्या
तुजला लडिवाळा
निजवाया येई मिट्ट काजोळा
मनमोहन बाळा
निद्रेचा सगळा का धांडोळा
निज निज निज बाळा ||२||
अरे माझ्या सोन्या, त्या निरांजनातल्या वाती सुद्धा आता शांत होत विझल्या आहेत. अरे आता तुला झोपवायला मिट्ट काळोख आलेला आहे बघ. तरी सुद्धा न झोपता का एवढी झोपेची वाट बघतोस ? आता शहाण्यासारखा झोपी जा.
इथे काजोळा, धांडोळा या थोड्या अपरिचित शब्दांनी छान स्वरयमक जुळले आहे.इथेही लडिवाळा, बाळा, सगळा, धांडोळा, काजोळा यामधे सुंदर अनुप्रास साधलेला आहे.
चांदोबा आला
घेउनिया तारका नि चांदण्या
चांदणे तुजला
अंगाई गाई निजवायला
डोळा पेंगुळला
मिटुनिया पापणीच्या पंखाला
निज निज निज बाळा ||३||
अरे बघ, तो आकाशीचा चांदोबा तारका आणि चांदण्या घेऊन आला आहे. त्याचे हे चांदणे तुला निजवायला अंगाई गाते आहे. तुझे डोळे सुद्धा पेंगुळले आहेत. बाळा आता पापण्यांचे पंख मिटू देत. आता गाई गाई कर.
इथे गोष्टीतून, गाण्यातून ओळख झालेला चांदोमामा आणि त्याच्या चांदण्या बाळाच्या भेटीला येतात.इथेही छान अनुप्रास साधलेला आहे.
पाडसे निजली
हम्मेच्या शेजारी पहुडली
दूध पाजविले
कपिलेने त्यांना रे निजविले
तया ना झोपाळा
तरी ही ती शांत कशी झोपली
निज निज निज बाळा ||४||
अरे सोनुल्या, गाईची वासरं सुद्धा शहाण्या बाळासारखी तिच्या शेजारी झोपली आहेत. या कपिलेने त्यांना दूध पाजवून झोपविले आहे. त्यांच्यासाठी झोपाळा पण नाही. तरी सुद्धा बघ त्यांना कशी शांत झोप लागली आहे. मी तर तुला झोका देते आहे. तू पण आता शांत झोप.
आता इथे बाळाची समज वाढल्याने हम्मा आणि तिचे बाळ वासरू त्याचे दोस्त झालेले आहेत.
जादुई दुलई
घेउनी तुज निजवायला आली
तव सखी परिराणी
झोकाळा देई तुज झुलवूनी
वाजवी ना वाळा
नीज अता मिटुनी घेई डोळा
निज निज निज बाळा ||५||
अरे तुझी मैत्रीण ती परी राणी आहे ना ती तुझ्यासाठी जादूची दुलई घेऊन आली. तू झोपावंस म्हणून ती पण तुला झोका देते आहे. तेव्हा आता पायाचा चाळा थांबव. वाळा वाजवू नकोस. आता पटकन डोळे मिटून घे आणि शांत झोपी जा.
आता इथे गोष्टीतली परी राणी बाळाला भेटायला येते. त्याला झोका देऊन झुलवीते सुध्दा. झोकाळा, वाळा, डोळा, बाळा यात छान अनुप्रास साधला आहे त्यामुळे कवितेची लय आणखीन वाढली आहे.
शांत तरूतळा
विसावुनी पाचोळा ही निजला
वारा ही शमला
सैरभरा घोंगावूनी थकला
शिणविसी का डोळा
झुलवीते तुझ देउनी हिंदोळा
निज निज निज बाळा ||६||
रात्रीच्या शांत वेळी शांत असणाऱ्या झाडाखाली पडलेला पाचोळा सुद्धा शांतपणे निजला आहे. सगळीकडे सैरावैरा घोंगावत धावल्यामुळे वारा सुद्धा खूप थकून आता शांत झाला आहे. मग तूच अजून का जागा आहेस ? मी तुला झोका देत जोजवते आहे. आता शांत झोप.
बाळ आता आजुबाजूच्या निसर्गात रमायला लागते. त्यामुळे झाडे, वारा त्याला समजायला लागतात हे इथे लक्षात येते.
हे कुलभूषणा
नाव करी दिगंत दाही दिशांना
तव रूप छान
आम्हाला तुझा किती अभिमान
तू अमुचा जीव
श्रीराम कृष्णसखा तू देव
निज निज निज बाळा ||७||
अरे सोनुल्या, तू आमच्या कुळाचे भूषण आहेस. तुझ्या गुणांनी, कर्तृत्वाने दाही दिशांत तुझे नाव होऊ दे. तुझे रुप हे खूप देखणे आहे. आम्हाला तुझा खूप अभिमान आहे. कारण तू आमचा जीव की प्राण आहेस. बाळा तू जणू श्रीराम श्रीकृष्णाचे गोजिरे बाळरूपडे आहेस. आता शांतपणे झोपी जा.
इथे गोष्टीतले राम-कृष्ण बाळाच्या भेटीला येतात. बाळ जसजसे मोठे होत जाते तसतसे त्याचे विश्व विस्तारत जाते. त्याच्या बालविश्वात हळूहळू परिसरातले सगळे प्राणी, पक्षी, गोष्टीतली पात्रे, आजुबाजूची माणसे बदलत जातात. अंगाईच्या प्रत्येक कडव्यात त्याचा छान उल्लेख आला आहे.
या अंगाई गीतात बाळाला झोपवताना आईच्या मनातील कोमल भावना अचूक शब्दात उत्कटपणे व्यक्त झाल्या आहेत. या भावपूर्ण रचनेतील कवीचे शब्दसामर्थ्य प्रभावी आहे.
कवितेत बहुतेक सर्व कडव्यात छान अनुप्रास साधलेला आहे. त्यामुळे कवितेची विशिष्ट लय वाढलेली आहे आणि कवितेला नैसर्गिक स्वरूमाधुर्य प्राप्त झालेले आहे. यामुळेच बाळाला आपोआप गुंगी येऊन झोप लागते.
चांदोबा तारका घेऊन आला, चांदणे अंगाई गाते, परी राणी झोका देते, पाचोळा निजला, वारा थकला या वाक्यरचनेत चेतनागुणोक्ती अलंकाराचा छान उपयोग केलेला आहे. त्यामुळे ही सर्व पात्रे गीतामध्ये जिवंत होऊन सामोरी येतात आणि या गीताची रंगत आणखीनच वाढते.
झोपताना शांत झालेले बाळ जास्त संवेदनशील झालेले असते, तशीच बाळाला झोपवणारी आई जास्तच भावनाप्रधान झालेली असते. तिच्या सर्व कोमल भावना उचंबळून येतात. अंगाईतून ती बाळाला आजूबाजूचा निसर्ग, प्राणी, पक्षी यांची माहिती, अगदी स्वतःची ओळख पण सांगते. बाळाच्या मनात ते सर्व कुठेतरी नोंदले जाते. बाळ यातून आईचा आवाज, स्पर्श ओळखायला शिकते. सर्व गोष्टी ओळखायला लागते. शेवटी त्याला देवाच्या बाळरूपात बघणारी आई आपल्या तान्हुल्याचे मोठे झाल्यावरचे, त्याच्या यशाचे, कर्तृत्वाचे स्वप्न बघायला लागते.
या सर्व तरल भावना या कवितेत उत्स्फूर्तपणे व्यक्त झालेल्या आहेत. हळव्या मातृ हृदयाचे भावपूर्ण हुंकार अतिशय उत्कटपणे मांडणारी ही डॉ.श्रोत्री यांची भावमधुर अशी अंगाई आहे.
प्रस्तुत कविता स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ते रत्नागिरी येथे स्थानबद्ध असताना १९२६ मधे लिहिली आहे. (ते शाळकरी असताना लिहिली असा कांही लोकांचा गैरसमज आहे.)
या कवितेत प्रखर बुद्धिमंत सावरकरांनी फारशा प्रचलित नसलेल्या पण चपखल अशा मराठी व संस्कृत शब्दांचा वापर केला आहे. उदा. संभूत, दिप्तितम, चर्ची, गूढाशा, शोणित इ. या कवितेची रचना भूपतिवैभव या मात्रावृत्तात केलेली आहे.
छत्रपती शिवाजीमहाराज हे भारतीयांचे स्फूर्तिस्थान आहेतच पण त्यांच्याविषयी सावरकरांसारखा प्रखर देशभक्त जेंव्हा स्फुर्तीगीत लिहितो तेंव्हा ते महाराजांच्या भवानी तलवारीसारखं तेजःपुंज व धारदार होतं. पं. हृदयनाथ मंगेशकर व गानकोकिळा लता मंगेशकर या द्वयीने हे गीत स्फूर्तिदायक व रोमांचक बनवण्यात मोलाचं योगदान दिलेलं आहे. त्यांचे सूर व संगीत इतकं अर्थवाही आहे की गीत ऐकल्यानंतर कुणीही भारतीय रोमांचित झाल्याशिवाय रहात नाही. या तीन कडव्यांच्या गीताच्या पहिल्या कडव्यात महाराजांचं स्तुतीपर वर्णन करून त्यांना वंदन केलेलं आहे. दुसर्या कडव्यात हिंदुस्थानातील सद्यस्थितीचं (त्या काळातलं -१९२६ मधलं) वर्णन केलं आहे आणि तिसऱ्या कडव्यात महाराजांकडं मागणं मागितलेलं आहे. जेणेकरून आपला स्वातंत्र्य लढा यशस्वी होईल.
पहिल्या कडव्यात ते महाराजांचं वर्णन ” हिंदूंच्या शक्तीतून प्रकट झालेलं तेज, हिंदूंच्या वर्षानुवर्षांच्या तपस्येचं फलित म्हणून जन्मलेला तेजःपुंज ईश्वरी अवतार, हिंदुदेवतेचा सौभाग्यालंकार, नरसिंहाप्रमाणे दुष्टांचे निर्दालन करण्यासाठी अवतरलेला प्रभूचा अवतार” असं केलं आहे. आणि ते म्हणतात हे हिंदुराष्ट्र तुला वंदन करीत आहे, चंदनाचा लेप लावून तुझं पूजन करीत आहे, अंतःकरणपूर्वक अभिनंदन करीत आहे. सावरकर म्हणतात, ” माझ्या मनात ज्या गूढ आशा आहेत त्या मी तुला कथन करू शकत नाही. तरी त्या ओळखून, हे नृसिंहाचा अवतार असणाऱ्या शिवाजीराजा माझ्या या इच्छा तू पूर्ण कर. ” ही कविता लिहिली तेंव्हा सावरकर स्थानबद्धतेत असल्यामुळे स्वातंत्रप्राप्तीची इच्छा प्रकट करू शकत नव्हते म्हणून ‘गूढाशा’ हा शब्द वापरला आहे.
दुसर्या कडव्यात परकीय आक्रमणामुळे देशाच्या झालेल्या दुरावस्थेचं वर्णन केलं आहे. महाराजांनी निर्माण केलेल्या, जतन केल्या गड किल्ल्यांची अवस्था सांगितली आहे. कुठे तट भंगले आहेत, गड, कोट, किल्ले, जंजिरे भग्न पावले आहेत, राजधान्यांची जंगले झाली आहेत, साऱ्या मंगलगोष्टी परदास्यामुळे पराभूत झाल्या आहेत. महाराजांसारखे वीरपुरूष नसल्यामुळे भवानी तलवारीची धार गंजली आहे. अशातच आई भवानीही आधार देत नाही. अशा या जगात जगणं अत्यंत लज्जास्पद झालं आहे.
तिसऱ्या कडव्यात सावरकर म्हणतात, ” ज्या शुद्ध हृदयाच्या राजाला रामदास स्वामींनी आपलंसं केलं होतं, ज्या बुद्धिमान राजाने विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही, गोवळकोंड्याची कुतुबशाही, बिदरची बरीदशाही व वऱ्हाडची इमादशाही अशा पाच शाह्यांना ‘त्राहि भगवान’ करून सोडलं होतं, जो राजा कूटनीतीचा युक्तीने उपयोग करून, वेळप्रसंगी तह करून, बलवान शत्रुला गाफील ठेऊन पराभूत करीत असे ; त्या राजाची अंतःकरणाची शुद्धी आमच्या कृतीत उतरू दे. ती बुद्धी माझ्या भाबड्या देशबांधवांना लाभूदे. ती शक्ती आमच्या नसानसातून (रक्तातून) वाहू दे. हे राजा, जो स्वराज्याचा मूलमंत्र तुला समर्थ रामदास स्वामींनी दिला, तो मंत्र तू आम्हाला दे. म्हणजे त्या मंत्रसामर्थ्याने, ती शक्ती व युक्ती वापरून, त्या शुद्धी व बुद्धीच्या योगाने आम्ही हिंदुस्थानचे बांधव परकियांना येथून हुसकावून स्वातंत्र्यप्राप्ती करून घेऊ. “