मराठी साहित्य – क्षण सृजनाचे  ☆ शकुनी,एक धगधगता सुडाग्नी ☆ सौ.मंजिरी येडूरकर ☆

सुश्री मंजिरी येडूरकर

? क्षण सृजनाचे ?

शकुनी, एक धगधगता सूडाग्नी ! ☆ सौ.मंजिरी येडूरकर ☆

 

काळ्या कभिन्न सावल्यात तारूण्याचा मळा

अन् तुटलेल्या काळजात अजरामर कळा

देहच काय, सगळंच होऊन पडलं गलितगात्र

अन् जरा बनलं एक विदुषकाचं पात्र

काय चुकलं माझं? नसानसात घृणा पेटलेली

जळणाऱ्या डोळ्यांनी, युगायुगाची आग ओकलेली

निधड्या छातीनं भर सभेत लाज ओरबाडली

षंढांच्या बाजारात गोळा केली आसवं गाळलेली

माझा विडा कुणी उचलावा? सावलीत खुडलेलं कर्तृत्व

निवडुंगाच्या उलट्या काट्यांनी पोखरलेलं स्वत्व

गंजलेली शस्त्रं अन् झाकोळलेलं आयुष्य, भितीनं!

कुणाच्या बाहुच्या, कुणाच्या बाणाच्या तर कुणाच्या  नितीनं!

बापानं आपलाच भेजा भरवला बाळवाटीनं!

भूत अन् भविष्य ढकलत राहिला जळत्या काडीनं

 कुरवाळायचं कुठल्या आगीला अन् ठेचायचं कुठल्या आगीला

हे ठरवणार कोण? यांच्या कुलस्त्रिया अन् लंपट बासरीवाला!

मी कधीच हरलो नाही अन् हरणार ही नाही

मी कधीच चुकलो नाही अन् चुकलेल्यांना माफही करणार नाही

माझ्या या अवस्थेस कारणीभूत, ही मूर्ख कौरव प्रजा

हा सूड घेण्यात झालो यशस्वी, नष्ट झाला अंध राजा

अजूनही कित्येक सूड आहेत शिल्लक धगधगते

सत् शील, सत् कर्म, सत् वचन यांच्या बुरख्यात होते

युगानुयुगे मी जन्म घेत राहीन, हा सुडाग्नी पेटता राहील

खरे सत्य युग येईल, तेंव्हाच हा आत्मा शांत होईल!

 

कवितेचा अर्थ स्पष्ट होण्यासाठी शकूनीची कथा, त्याच्याच शब्दात! –

काळ कोठडीतला तो एक एक दिवस अजून पोखरतोय. आई, वडील – सुबल ( गांधार देशाचा राजा),सगळी भावंडं यांना भुकेनं तडफडून मरताना पाहिलंय मी! काय गुन्हा होता आमचा? केवळ गांधारीच्या पत्रिकेतील दोष घालवण्यासाठी केलेला तो एक उपाय होता. तो ही राजा ध्रुतराष्ट्राच्या दीर्घायुष्यासाठी!आणि उगाच विधवेशी लग्न लावून दिलं, असा कांगावा केला. त्यात आमचा काही स्वार्थ होता का? अशी ती कोणती कौतुकास्पद, अभिमानास्पद गोष्ट होती की ती सर्वांना आवर्जून सांगावी. असेलही ती आमची चूक, तुम्हाला न सांगण्याची! पण ती तुमच्या चुकीपेक्षा तर मोठी नव्हती.चूक कसली, फसवणूक होती ती आमची, सत्तेच्या बळावर, स्वार्थासाठी केलेली!

भीष्म पितामह गांधारीचा हात मागण्यासाठी आले होते. त्यांना माहीत होतं, आम्हाला नाही म्हणता येणार नाही, इतकं त्या सोयरिकेला राजकीय महत्त्व होतं. आणि होय म्हणणं पण अवघड होतं. शंकर आराध्य असणाऱ्या त्याचा आशीर्वाद असणाऱ्या एका  सुंदर राजकुमारी ने एका अंध राजाशी लग्न का करावं? शेवटपर्यंत राजा गांधारीला विचारत होता, नाही म्हणू या का ? वडिलांची द्विधा मनस्थिती लक्षात घेऊन गांधारीने डोळ्यावर पट्टी बांधली व प्रतिज्ञा केली की ही पट्टी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत अशीच राहील. आणि म्हणाली आता तुमच्या मुलीला योग्य वर मिळाला आहे नं! लग्न झालं, नंतर आम्हा सर्वांना काळ कोठडीत टाकून गांधार राज्य काबीज केलं.

एक बरं केलं, आम्हाला पोटभर अन्न दिलं नाही. त्यामुळे सगळे लवकर गेले, यातनातून मुक्त झाले. पण त्यांनी मला जगवलं. नुसतं जगवलं नाही तर माझ्या मनात सुडाग्नी धगधगत ठेवला. मी षडयंत्र रचण्यात पटाईत होतो. वडिलांनी मला द्युत खेळण्यास शिकविले. त्यांच्या आज्ञेप्रमाणे मनावर दगड ठेवून मी त्यांच्या हाडांचे फासे केले, जे माझ्या आज्ञेत राहणार होते. किती क्रोध, किती मत्सर, किती जळफळाट माझ्या मनात कोंडला असेल याची कोणी कल्पनाच करू शकणार नाही. माझं नशीब बलवत्तर म्हणून मी एकटा उरल्यावर माझी सुटका केली व चक्क राजमहालात प्रवेश दिला. खोटा अहंकार, फाजील आत्मविश्वास, सत्तेचा माज यामुळे त्यांना वाटलं असेल की हा आपलं काय वाकडं करू शकणार! ही गुर्मी माझ्या पथ्यावर पडली आणि मी या संधीचं सोनं करायचं ठरवलं. मी शांत राहून प्रेमाचं नाटक केलं, सगळ्यांचा विश्वास संपादन केला. नको इतकं त्यांना पांडवांच्या विरूध्द भडकवित राहिलो. द्यूत हा माझा हुकुमाचा एक्का वापरला. पांडवांची मानहानी करून कौरवांच्या मनात आणि महालात स्थान पक्कं केलं.

युधिष्ठिर सद्गुणी, सत्यप्रिय  इत्यादी गुणांचा पुतळा असल्यामुळे  त्याच्यावर कुरघोड्या करणं सोपं होतं.इतर पांडव कसेही असले तरी मोठ्या भावाच्या आज्ञेत होते.

कुंती माता तिच्या तीनही मुलांना घेऊन वनातून हस्तिनापूरला आली, त्यांना युध्दाचं शिक्षण देण्यासाठी!तिकडे माद्रीला अश्विनी कुमार यांच्या पासून दोन मुलगे झाले.ते दोघेही वैद्यक शास्त्रात निपुण झाले. जसं मोठ्या झाडाच्या छायेत लहान झाडं खुरटतात, तसं थोडं त्यांचं झालं. सहदेवला त्रिकाल ज्ञानी होण्यासाठी पंडू राजाने अंत्य समयी आपल्या मेंदूचा काही भाग खाण्यास सांगितले. त्याला भविष्याचे ज्ञान झाले, त्यामुळेच द्युत खेळण्यासाठी सगळे निघाले तेंव्हा त्यांना अडविण्याचा आटोकाट प्रयत्न सहदेव ने केला, निदान द्रौपदीला नेऊ नका म्हणाला, त्याच्या म्हणण्याला महत्त्व कोण देणार? विधिलिखित कुणालाच पुसता येत नाही, ते सहदेवला कसं येणार! दैव माझ्या बाजूने होते कारण माझीही बाजू सत्याचीच होती.

कौरवांनी पांडवांना मारण्याचा प्रयत्न बऱ्याच वेळा केला. पण मी निर्धास्त होतो कारण मला माहित होतं की द्रौपदीला वस्त्र पुरविणारा कृष्ण काहीही करू शकतो. पांडव मेले असते तर कौरव मदोन्मत्त झाले असते, मग माझ्या सुडाचं काय? अखेरीस सगळ्या गोष्टी माझ्या मनाप्रमाणे घडत गेल्या आणि कौरव – पांडव यांच्यात निर्णायक महाभारत सुरू झालं. अर्थात माझ्याबाबतीत सुध्दा विश्वासघात झालाच.दोघांच्या जवळचे बाण संपल्यावर रथावरून उतरून सहदेव बोलणी करण्यासाठी आला म्हणून मी ही रथावरून उतरून आलो तेंव्हा त्याने मला बेसावध पाहून तलवारीने घाव घातला. मृत्यूचं दुःख नव्हतंच. कारण तो युध्दाचा शेवटचा दिवस होता, त्यामुळे एकन् एक कौरव मारला गेला हे माझ्या डोळ्यांनी पाहून मी तृप्त झालो होतो. माझा जगण्याचा उद्देश्य सफल झाला होता. या युद्धात पांडव, यादव सगळेच भरडले गेले. त्यामुळे माझ्या आनंदात भर पडली होती. पांडव, कृष्ण यापैकी कोणाबद्दल ही मनात ओला कोपरा नव्हताच. कारण शक्य असूनही यांच्यापैकी कोणीही आम्हाला सोडवण्यास  आले नव्हते.  तो भीष्म आणि त्याचा हा सगळा पसारा उध्वस्त झालेला पहायचा होता. भले युद्धानंतर कुणी काय गमावलं, कुणी काय कमावलं यावर चर्चा होत राहतील, पण निष्कर्ष एवढाच असेल की फक्त मी हे युद्ध पूर्णपणे जिंकलो! फक्त मी जिंकलो!!!

गुगल वरील महाभारताच्या ‘न ऐकलेल्या गोष्टी ‘  यांच्यावर आधारित

© सौ.मंजिरी येडूरकर

लेखिका व कवयित्री, मो – 9421096611

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – क्षण सृजनाचे ☆ ☆ पाणवठा…! ☆ श्री सुजीत कदम  ☆

श्री सुजीत कदम

? क्षण सृजनाचे ?

💦 पाणवठा…! 💦 ☆ श्री सुजीत कदम 

कसं असतं ना आपल्या लेखकांचं..?

काही वेळा खूप लिहायचं असतं.. पण विषय सुचत नाही.एखादा विषय सुचलाचं तर, काय लिहायचं हेच कळत नाही. कथा लिहायची, कविता लिहायची, की ललित लेख..? का आजकाल सर्वांनाच आवडणारी गझल लिहायची..? नक्की काय लिहायचं हेच कळत नाही. हे सारं ठरवत असताना सुचलेला विषय हळूहळू पुसट होत जातो आणि मग आपण पुन्हा नव्याने एखाद्या विषयाच्या शोधत हरवून जातो.. हे सगळं करत असताना सहज हसू येतं ते लहान पणीच्या एका कवितेने

“घड्याळात वाजला एक,

आईने आणला केक

केक खाण्यात एक तास गेला

मी नाही अभ्यास केला”

हे असंच काहीसं.. अजूनही होतंय की काय असं वाटतं राहत… दिवस भर विचार करून जेव्हा काहीचं लिहलं जात नाही तेव्हा आपल्यातला लेखक कुठे हरवलाय की काय..? असं वाटू लागतं. हे करता करता, दिवसा मागून दिवस जातात आणि एखाद्या दिवशी काहीच ठरवलं नसताना अगदी सहज भरं भर कागदावर काहीतरी उतरतं.. आणि मग… इतके दिवस ह्या विषयावरुन त्या विषयावर फिरणारं मन, एक वेगळाच विषय घेऊन कागदावर स्थिरावतं. तेव्हा कागदावर उतरलेले शब्द पाहिले ना की मनात येतं.. “

कित्येक दिवस दूर दूर चा प्रवास करून कुठल्याशा गावचे हे पक्षी..

ह्या पांढ-या शुभ्र कागदाच्या पाणवठ्यावर उतरले असावेत..

ह्या पाणवठ्याचा एकांत दूर करण्यासाठी…!

हे पक्षी काही क्षण थांबतील किलबिलाट करतील आणि पुन्हा उडून जातील..

एका नव्या प्रवासाच्या दिशेने…!

एका नव्या पाढं-या शुभ्र पाणवठ्यावर…

मी मात्र पुन्हा एका नव्या विषयाच्या शोधत फिरत राहीन पुढचे कित्येक दिवस वहिचा पांढरा शुभ्र पाणवठा घेऊन… पुन्हा काही नवे पक्षी , पांढ-या शुभ्र पाणवठ्यावर येतील ह्या एकाच आशेवर…!

© श्री सुजित कदम

पुणे

मो. 7276282626

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – क्षण सृजनाचे ☆ पावसाचे स्वरविश्व ☆ सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी) ☆

सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)

? क्षण सृजनाचे ?

💦 भाऊबीज 💦 ☆ सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी) 

    कुठे गेला अवचित

   भाऊ राया दूरवर…

    राहिली ना भाऊबीज

   असे मनी हुरहुर…|

 

     कसे आता सांगू कुणा

  दुःख मनातले माझ्या…

    विस्कटल्या वाटा साऱ्या

   माहेरच्या तुझ्याविना…|

 

    परतीच्या तुझ्या वाटा

     अशा – कशा हरवल्या….

     आशेच्या साऱ्याच लाटा

      विरुनिया आता गेल्या…|

 

     नको जाऊ विसरून

     बहिण -भावाचे नाते….

      तुझे – माझे बालपण

       अजूनही खुणावते…|

– शुभदा भास्कर कुलकर्णी

माझा पाठचा भाऊ शशिधर माझ्यापेक्षा आठवर्षाने लहान असल्याने त्याला लहानपणी सांभाळून घेणं ही मला माझी जबाबदारी वाटायची. आम्ही मोठे होत गेलो तसा तो माझा मित्र, खेळातला सवंगडी होत गेला. आम्हा दोघांच नात दृढ, घट्ट होत गेलं. माझ्या लग्नानंतर, त्याच्याही लग्नानंतर आमच नातं थोडही सैल झालं नाही. आमची सुख-दु:ख आम्ही वाटून घेतली. आधार दिला. मी त्यावेळी भाऊबीजेला इथे नव्हते. दुसरे दिवशी येणार,असल्याने  सर्व भावंडानी माझ्याकडे नंतर भाऊबीज करायची ठरले. पण… शशीच्या अचानक जाण्याने मनं सुन्न, बधिरस झालं. भाऊबीज राहून गेल्याची हुरहूर आजही आहे. ते माझं दु:ख मी त्यावेळी नकळत कागदावर मोकळ करायचा प्रयत्न केला. अन् थोडं हलकं वाटलं. आज भाऊबीज, माझ्या भावना त्याच्यापर्यंत पोहोचल्या असतील का?.. 😢

©  शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)

कोथरूड-पुणे.३८.

   मो.९५९५५५७९०८ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – क्षण सृजनाचे ☆ जीवनपट… ☆ सुश्री दीप्ती कुलकर्णी ☆

सुश्री दीप्ती कुलकर्णी

? क्षण सृजनाचे ?

☆ जीवनपट… ☆ सुश्री दीप्ती कुलकर्णी ☆

माझे वडील संस्कृत चे माध्यमिक शिक्षक व गाढे अभ्यासक होते. जुन्या अकरावीचे संस्कृत व पी.टी. घेत. करवीर पीठात त्यांनी उत्तम अध्ययन केले. त्यांना पीठाचे शंकराचार्य पद स्वीकारा म्हणत होते पण घरच्या जबाबदाऱ्या मुळे त्यांनी ते स्वीकारले नाही. वृद्धत्वात ते थोडे विकलांग झाले नि ते पाहून मला ही कविता स्फुरली‌.

 – दीप्ती कुलकर्णी

☆ जीवनपट… ☆ सुश्री दीप्ती कुलकर्णी ☆

जीवनाच्या या पटावरी

कितीतरी प्यादी येती जाती

माझे,माझे म्हणती सारे

फोलता हि नच ,कुणा ही ठावे

क्षणभंगुरता कळेल का परी

उरते अंती मृत्तिका जरी

यात्रिक सारे सममार्गावरी

नियतीचीही मिरासदारी

नियतीचीही सर्व खेळणी

कुणा छत्र,कुणी अनवाणी

श्वासासंगे श्वास येई रे

दुजा न कोणी सांगाती

जीवनाच्या या पटावरी

कितीतरी प्यादी येती जाती ||

© सुश्री दीप्ति कुलकर्णी

हैदराबाद

मो.नं. ९५५२४४८४६१

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – क्षण सृजनाचे ☆ घड्याळ गणित… ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

? क्षण सृजनाचे ?

☆ घड्याळ गणित… ☆ श्रीशैल चौगुले ☆  

भगवद्गिता  ज्ञानेश्वरीतील “सांख्ययोग” या अध्यायात  हेच तर ज्ञानसूत्र फक्त अंकशास्त्राऐवजी तत्वसिध्दांताद्वारे सांगीतले गेले आहे.

आपण सगळे वेळेच्या बंधनात हे कर्म करीत असतो.प्रत्येक घडणार्या क्रिया ठरलेल्या वेळेनुसार एक जीवनाचे गणितीय सिध्दांतानुसार फिरत असते. पंचमहाभूते आणि हे त्रिगुणातीत सजीव घड्याळ भगवंताचे एक सांख्यीकिय कालगतीचे चक्र आहे. जिथे मृत्यू हा नाहीच. फक्त आत्मा एक देह सोडून दुसर्या देहात प्रवेश करतो. जसे घड्याळातील वजाबाकीचे उणे होत जाणारे काटे परत बेरजेतून तासात मोजतो तसे.🙏

☆ घड्याळ गणित… ☆ श्रीशैल चौगुले ☆

यालाच म्हणतात वेळ

यालाच म्हणावे गणित.

यातच आयुष्य नि वय

सरते सुख-दुःखी नित.

बेरजेचे ऊत्तर एक

वजाबाकी उणे प्रत.

आडवे समान उत्तर

वेळ  समांतर गत.

सेकंद मिनीट तास

अंकांचे गुपीत द्युत.

घडती फेर्यांचे चक्र

प्रभात-संध्येचे रथ.

ड्याळ बुध्दि प्रमाण

जीवन तैसेची पथ.

कर्म फळ नि भोगांचे

अंतर जन्मांचे नत.

© श्रीशैल चौगुले

मो. ९६७३०१२०९०.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – क्षण सृजनचा ☆ माझी फुलराणी ☆ श्री सोमनाथ साखरे ☆

?  क्षण सृजनचा ?

☆ माझी फुलराणी ☆ श्री सोमनाथ साखरे ☆  

काही दिवसांपूर्वी माझ्या मैत्रिणीच्या मुलीचा विवाह सोहळा संपन्न झाला. आईची सखी बनून राहिलेल्या लाडक्या लेकीच्या आठवणीने व्याकुळ झालेल्या आईने (लेकीसाठी) मला तिच्या मनातील भावना कवितेत शब्दबद्ध करण्याचा आग्रहवजा विनंती केली आणि

“माझी फुलराणी” ही कविता अवतरली…..

☆ माझी फुलराणी ☆

तुज लाडाची लेक म्हणू की

प्रिय सखी तू माझी गं…

विरह तुझा साहण्या अजुनी

मन माझे ना राजी गं…

 

अजून आठवे विवाह वेदी

सनई, चौघडे गाणी गं…

क्षणाक्षणाला तुझी आठवण

डोळ्यामध्ये पाणी गं…

 

नको करू तू इथली चिंता

कुशल मंगल सारे गं…

संसार तुझा कर सुंदर आता

हो राजाची राणी गं…

 

नवं नात्यांची मांदियाळी

मधुर ठेव तू वाणी गं…

दोन कुळांचे तूच भूषण

ठेव सदा तू ध्यानी गं…

 

आनंद,सुखाची बाग फुलू दे

हास्य निरागस वदनी गं…

आशीर्वाद मम नित्य तुझ्यावर

तू माझी “फुलराणी” गं…

 

©  सोमनाथ साखरे,

नाशिक.

९८९०७९०९३३.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – क्षण सृजनाचे ☆ सप्तपर्णी…. ☆ श्री विजय गावडे

श्री विजय गावडे

? क्षण सृजनाचे ?

☆ सप्तपर्णी…. ☆ श्री विजय गावडे ☆  

दोनेक महिन्यापूर्वी मोहोराने भारलेले सातिवनाचे (सप्तपर्णीचे) डेरेदार वृक्ष आता मुंडावळ्यागत लोम्बणाऱ्या शेंगानी लगडलेत.  फळेच्छुक इतरही वृक्षवल्ली आपापल्या तान्हूल्या फळांचे लाड करतांना दिसताहेत.  वने आणि मने दोन्ही प्रफूल्लीत करणारी हि निसर्ग किमया आपसूकच कवितेत उतरते ती अशी

 

सप्तपर्णी

 

शेंगाळले सातिवन

वने झाली आबादान

रायवनातून घुमे

काक – कोकीळ कुंजन

 

कानी घुमतो पारवा

अंगी झोंबतो गारवा

गार गार वाऱ्यातून

मंद सुगंध वहावा

 

फुले कोमेजून आता

फळे सानुली रांगती

जंगलाच्या राऊळात

गोड अंगाई झडती

 

कोण फळानी बहरे

कोणी  लगडे शेंगानी

निसर्गाचं जसं देणं

घेई धरती भरुनी

 

भारावून वेडे पक्षी

गाती सुरात कवने

रानी वनि जणू भरे

गितस्पर्धा आवर्तने

 

मात करुनी असंख्य

निसर्गाच्या कोपांवर

दिसा मासी सावरे

धरणीमायेचा पदर

 

उठा आतातरी गेली

गत वरसाची खंत

घेऊ भरारी नव्याने

आसमंत ये कवेत.

 

© श्री विजय गावडे

कांदिवली, मुंबई

मो 9755096301 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈




मराठी साहित्य – क्षण सृजनाचा ☆ आठवणीतला हळदुल्या ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी

सुश्री तृप्ती कुलकर्णी

अल्प परिचय
ग्राफिक डिझायनर आणि साहित्यिक सल्लागार, पुणे

☆ क्षण सृजनाचा ☆ आठवणीतला हळदुल्या ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆ 

काही दिवसांपूर्वी एक हळदुल्या रंगाचा पक्षी आमच्या बाल्कनीत येऊन छानपैकी गोडगोड शिळ वाजवत बसायचा. अगदी नेमानं ठरल्यावेळी यायचा, गाणं गायचा आणि जायचा. बऱ्याचदा मी तेव्हा वाचत बसलेली असायचे. पण त्याचं गाणं सुरु झालं की माझं वाचन थांबायचं आणि नकळत त्याच्याबद्दल विचार चालू व्हायचे…  तो इथंच का येतो…  कुणासाठी येतो…  बरं आला तर त्याच्यासाठी  टाकलेले दाणेही खायचा नाही. नुसताच फाद्यांवर झोके घेत बसायचा आणि गाऊन निघून जायचा. 

माझ्या चाहूलीने त्याची गानसमाधी भंग पावू नये म्हणून मी तिथं जाऊन त्याचा फोटो काढण्याचा आणि  व्हिडिओ करण्याचा मोह टाळला. फक्त एकदाच हळूच दाराच्या फटीतून त्याची ओझरती झलक पाहिली. अतिशय सुंदर तेजस्वी असा पिवळा रंग पटकन नजरेत भरला. पक्षी चिमुकला खरा पण सौंदर्य केवढं! अजून जवळ जाण्याचा प्रयत्न केला पण तेवढ्या चाहुलीने तो उडाला आणि दूर लपून बसला. जेव्हा मी दार बंद करून माझ्या जागेवर येऊन बसले तेव्हा तो परत फांदीवर येऊन बसून गाऊ लागला. 

मग मी काही मिनिटांचं त्यांचं असणं फक्त अनुभवायचं ठरवलं. त्याची गाण्यामागची आंतरिक उर्मी काय असेल याचा विचारही मी सोडून दिला. डोळे बंद करून फक्त ऐकत राहिले. त्या सुरांचा कानोसा घेत राहिले. 

हळूहळू मनातच त्या गाण्यात कुठले शब्द बसतील, ते सूर विरहाचे की आनंदाचे, तो पक्षी पूर्णपणे कसा दिसत असेल अशी कल्पना चित्रं रंगवायला लागले. रोज पंधरा-वीस मिनिटं मी मनातल्या मनात रानावनात जाऊन वेगवेगळ्या पिवळ्या रंगाच्या पक्षांचा शोध घ्यायला लागले‌. उगाचच, काही कारण नसताना‌… ती पंधरा मिनिटं मला हिरव्या-पिवळ्या रंगाची वेगळीच दुनिया दाखवणारी ठरली. कधी प्रत्यक्षात बघितलेले झाडांच्या दाटीवाटीत बसलेले पक्षी, कधी चित्रपटातले, तर कधी इंटरनेटवर बघितलेले व्हिडिओ त्यातले सगळे फक्त पिवळ्या रंगाचे पक्षी आठवण्याचा प्रयत्न करू लागले. आणि काय गंमत, हे आठवताना फक्त पक्षीच नव्हे तर कितीतरी वेळा नदीचा काठ, निळं आकाश, रंगीत फुलं, हिरव्यागार फांद्या असंही काहीबाही दिसू लागलं. अर्थातच खूप छान निवांत असं वाटत होतं. मग मी माझ्या या अवस्थेला एक नाव देऊन टाकलं… ‘हळदुली समाधी’.   

आणि मग काही दिवसांनी तो यायचा अचानकच बंद झाला. सुरुवातीला दोन-तीन दिवस थोडी हूरहूर वाटली पण मग ठरवलं याला आठवणीत बंदिस्त करावा आणि म्हणूनच त्या पक्षाने मला काय काय दाखवलं ते मी या कवितेत मांडलं——-

हळदुल्या…

एय, हळदुल्या रंगाच्या पक्ष्या 

आमच्या अंगणात येऊन 

तू नेहमी नेहमी गातोस काय

खरं सांग, हळदुल्या तुझं आमचं नातं काय

 

शेवंतीच्या फांदीवर बसून मस्त झोके घेतोस 

हिरव्या हिरव्या पानांशी दंगामस्ती करतोस

खरं सांग कशासाठी, कोणासाठी तू इथं येतोस 

आणि इतकं गोड गाणं पुन्हा पुन्हा गातोस

खरं सांग हळदुल्या…

 

दवं भरलेल्या झाडांना आताशी जाग येते आहे

इवल्या इवल्या फुला-पानांवर ऊन कसं डुलतं आहे 

इतका उंच उडतोस तरी तुला दिसत नाही काय

चमचमत्या चांदण्याचाही अजून निघेना इथून पाय 

खरं सांग हळदुल्या… 

 

असा कसा तू आगंतुकपणे उडत उडत येतोस 

इथल्या पानाफुलांशी आपलं नातं जोडतोस 

इथल्या मऊ मातीशी कसलं हितगूज करतोस

तुझ्या गोड गाण्यासाठी सूर तिचे घेतोस काय 

खरं सांग हळदुल्या… 

 

जाईजुईचा वेल कसा वर वर चढतो आहे

चाफ्याच्या फुलाशी खूप गप्पा मारतो आहे

गुलाबाच्या कळीला खोल खळी पडली आहे

एक भुंगा कसा बघ तिच्याभोवती फिरतो आहे

खरं सांग हळदुल्या… 

 

उंच उंच फिरण्याची तुला कित्ती कित्ती हौस 

पण मातीत खेळणाऱ्या पानांची करतोस भारी मौज 

त्यांचा पिवळा रंग पिऊन तु पिवळा होतोस काय 

खरं सांग हळदुल्या– तुझं आमचं नातं काय

आमच्या अंगणात येऊन तू नेहमी नेहमी गातोस काय——-

 

©  सुश्री तृप्ती कुलकर्णी

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈




मराठी साहित्य – क्षण सृजनाचे ☆ तालीबानी….! ☆ श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

? क्षण सृजनाचे ?

☆ तालीबानी ……! ☆ श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

अध्या अफगाणिस्तानातील सत्तांतर आणि तालिबानी राजवटीची पुनर्स्थापना हा माध्यमासाठी अग्रक्रमाचा विषय आहे.तालिबानी ही एक वृत्ती असून स्त्रियांच्या हक्काबाबत ते कमालीचे प्रतिकूल आहेत हे सर्वानाच माहीत आहे, आणि त्यावर चर्चा ही खूप केली जाते. तालिबानी वृत्ती ही खरेच वाईट आहे यात वाद नाही पण यावर चर्चा करणारा आपला पांढरपेशा वर्ग तरी खऱ्या अर्थाने महिलांच्या  बाबतीत उदारमत वादी आहेत काय? अनेक पुरुषांचे याबाबत खायचे नी दाखवायचे दात निराळे असतात. महीलांचे शोषण हा त्यांचा स्थाईभाव असतो. शिक्षणाने ही तो कमी होत नाही. मग असे वाटते काय त्या तालिबानी वृत्तीवर टीका करता? तुमच्या मनातील स्त्रियांबद्दल असलेले विचार तालिबानी वृत्तीचे नाही काय? याच विचारातून ही कविता मला स्पुरली, शब्दांकित झाली.

“तालिबानी !”

काय शोधतो रे तालिबानी अरबस्थानात

अरे बघ बसलाय तो तुझ्या मनात

 

पत्नी तुझी तुझ्याहून अधिक शिकली, रुतते ना मनास,

पोरगी अन्य धर्मीय,जातीय,विवाह रचते

हात उठतो का आशीर्वाद देण्यास.

 

काय शोधतो तालिबानी…..

 

देतोस समर्थन स्वधर्मिय हिंसाचारास

बघतो तिरस्काराने अन्यधर्मिय सेवाकार्यास,

कोरोना ग्रस्ताच्या सेवा कार्यातही खातो मलिदा

भिनलाय स्वार्थ कणाकणात

काय शोधतो………

 

खरंच मुलीच्या जन्माचा आनंद होतो का मनास

स्त्री भ्रूण हत्ये चा पश्र्चाताप ही नाही जनास

लपून केले गर्भजल परीक्षण,

अपराध न वाटे कुणास

स्त्री जन्मास स्त्री कशी रे कारणी

काय अर्थ रे शिक्षणास.

काय शोधतो……….

 

स्त्री देहाप्रती स्वापदासंम नजर तुझी,सोडेना रक्त संबंधांस

वरून सोंग तुझे निरागसाचे

वासना लाजविते वयास

काय शोधते…………

 

हुंड्यासाठी जाळतो सुनेला, ताडन पशुसंम  गृहलक्ष्मीला

तुजहून बरा तो तालिबानी

उघड दिसे हो अवतार खरा

काय शोधतो…….

 

© श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

चंद्रपूर,  मो. 9822363911

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈




मराठी साहित्य – क्षण सृजनचा ☆ कविवर्य ग्रेस ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित

श्री सुहास रघुनाथ पंडित

☆ क्षण सृजनचा ☆ कविवर्य ग्रेस ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ 

Grace IMG 1263.jpeg

जन्म नाव – स्व माणिक सीताराम गोडघाटे टोपणनाव – ग्रेस

(जन्म – १० मे, १९३७ नागपूर   मृत्यु – २६ मार्च, २०१२ पुणे)

झाली म्हणजे किती पटकन प्रसन्न होते.नाहीतर एकदा का रूसली की रूसलीच. कवितेच हे असच आहे.

26 मार्च. म्हणजे कविवर्य ग्रेस यांचा स्मृतिदिन. त्यांच्यावर आलेले लेख,व्हिडिओ पाहणे चालू होते. काही नवीन माहितीही मिळाली त्यांच्याबद्दल.  वाचणे चालू होतेच. पण त्यांच्या गूढगर्भात्मक कवितांच्या ओळी मनातून जात नव्हत्या. जे लेख वाचले त्यातही गूढता, दुःख यांचा उल्लेख होताच. आणि तरीही त्या कविता वाचू नयेत अस कोणालाच वाटत नव्हतं. अगम्यतेच आकर्षण. समजो न समजो, पुन्हा वाचाव्यात अशा कविता. नकळतपणे आपण गुंतत जातो त्यांच्यात. वाचलेल्या कविता, त्यांची झालेली गीते, सगळं कानाना ऐकू येऊ लागल आणि नकळतपणे मनात गुणगुणलो,

गूढ तुझ्या शब्दांची जादू

मनात माझ्या अशी उतरते…

आणि पुढचं कसं  सुचत गेलं, मलाही ठाऊक नाही. ती ही कविता, तुम्हांसाठी सादर.

☆ कविवर्य ग्रेस ☆

गूढ तुझ्या शब्दांची जादू

मनात माझ्या अशी उतरते

चांद्रनील किरणांच्या संगे

संध्येची जशी रजनी होते

 

कळू न येतो अर्थ जरी,पण

दुःखकाजळी पसरे क्षणभर

खोल मनाच्या डोहावरती

कशी होतसे अस्फुट थरथर

 

सोसत नाही असले काही

तरी वाचतो पुनः नव्याने

डोलत असते मन धुंदीने

हलते रान जसे वार्याने

 

ग्रेस,तुझ्या त्या काव्यप्रदेशी

माझे जेव्हा येणे झाले

जखम न होता कुठे कधीही

घायाळ कसे , मन हे झाले

 

संपत नाही जरी इथले भय

शब्दचांदणे उदंड आहे

त्या गीतांच्या स्मरणा संगे

दुःख सहज हे सरते आहे

साभार चित्र  – माणिक सीताराम गोडघाटे – विकिपीडिया (wikipedia.org)

©  श्री सुहास रघुनाथ पंडित

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈