मराठी साहित्य – जीवन रंग ☆ मृगजळातील हिरवळ (भाग – 5) (भावानुवाद) ☆ सुश्री सुमती जोशी

सुश्री सुमती जोशी

☆ जीवन रंग ☆ मृगजळातील हिरवळ (भाग – 5) (भावानुवाद) ☆ सुश्री सुमती जोशी ☆

पावलांचा आवाज ऐकल्यावर पुस्तक बाजूला सारून सरांनी समोर नजर टाकली. डोक्यावर काळे पांढरे केस. जडावलेला चेहरा काळ्या फ्रेमच्या चष्म्यामुळे अधिकच गंभीर वाटत होता.

विषयाला हात घालण्यापूर्वी सरांना खूश करावं म्हणून अशोकनं विचारलं, “सर, तुम्ही कसे आहात?”

काही क्षण भवेश सर अशोकाच्या चेहऱ्याकडे निरखून पहात राहिले. “मी ठीक आहे, पण मी तुला ओळखलं नाही. कसं ओळखणार? आता वय झालंय माझं! किती विद्यार्थी आले आणि गेले, सगळ्यांचे चेहरे लक्षात राहत नाहीत.”

मी त्यांचा विद्यार्थी आहे, असं सरांना वाटतंय. फारच छान! या खोटया नात्यामुळे माझं काम फत्ते झालं तर बरं होईल.

भवेश सर अजूनही अशोकाच्या चेहऱ्याकडे एकटक पाहात होते. हातातलं पुस्तक खाली ठेवून म्हणाले, “अरे, अगदी सुकून गेलाय तुझा चेहरा. पाणी देऊ?”

“हो सर, केव्हापासून तहान लागलीय.”

सर घरात गेले. एक लहान मुलगी, बहुतेक कामवाली असावी, हातात पाण्याची लोटी आणि वाटीत दोन लाडू घेऊन आली. अशोकनं गटागट पाणी पिऊन टाकलं. त्याच्या पाठी सर उभे होते.

“आपल्याला एक विनंती करायची आहे.”

हसून भवेश सर म्हणाले, “विद्यार्थ्यांनं केलेल्या विनंतीला मी नाही म्हणू शकेन का? बोल.”

अशोकनं बॅगेतून दोन पुस्तकं बाहेर काढली.

“ही व्याकरणाची पुस्तकं आम्ही नवीनच प्रकाशित केलीयत. सर, आपण ही पुस्तकं बघता का?”

“ठीक आहे. मी बघतो. तोपर्यंत तू लाडू घे.”

अशोक वरमला. ‘आपला माजी विद्यार्थी’ म्हणून सर किती प्रेम करतायत! आता एकदा पुस्तकं खपली की गंगेत घोडं न्हायलं.

खाऊन झाल्यावर अशोकनं वाटी बाजूला ठेवली आणि हळूच वर पाहिलं. भवेश सर पुस्तक चाळत होते. थोडया वेळानं पुस्तकं बाजूला ठेवत सर म्हणाले, “इतका वेळ आपण बोलतोय, पण मी तुझं नावही विचारलं नाही.”

“अशोक रॉय.”

“अशोक रॉय…’असं मनातल्या मनात पुटपुटल्यावर अचानक भवेश सरांचा चेहरा पडला. काही क्षण गप्प बसल्यावर म्हणाले, “तू आमच्या शाळेतून पास झालास?”

जरा इकडेतिकडे बघितल्यावर अशोक उत्तरला, “हो, सर.”

“किती साली?”

“दोन हजार एक.” सर काहीसे गंभीर झाले. त्यांनी चष्मा काढला.

“येतो सर.” पुस्तकांबद्दल अशोकाला काहीतरी बोलायचं होतं, पण धीर झाला नाही.

“ऐक”

सरांची हाक ऐकून गेटपर्यंत पोचलेल्या अशोकनं चमकून मागे वळून पाहिलं. “सर, आपण मला बोलावलंत?”

“तुझी पुस्तकं आम्ही शाळेकरता घेऊ.”

आनंदातिशयानं अशोकाचे डोळे लकाकले.

“खरंच सर, मी तुमचा आभारी आहे.”

गंभीर आवाजात सर हळूहळू बोलू लागले, “आभार मानायची काही जरूर नाही, पण तू माझ्याशी खोटं बोलतोयस. दोन हजार एक साली आमच्या शाळेतल्या अशोक रॉय नावाच्या एकाच मुलाने माध्यमिक परीक्षा दिली होती. खूप हुशार विद्यार्थी होता तो, पण रिझल्ट लागायच्या तीन दिवस आधी तो बसच्या अपघातात मरण पावला.”

एवढं बोलून भवेश सर क्षणभर थांबले. त्यांच्या चेहऱ्यावरचे गांभीर्य हळूहळू लोप पावले आणि त्याची जागा विषण्णतेनं घेतली. “तो अशोक रॉय कोण होता माहितेय का तुला? तो होता माझा एकुलता एक मुलगा.”

क्षणार्धात अशोकाच्या ह्रद्यात एक तीव्र कळ उमटली. त्याला असह्य वेदना जाणवू लागली. तोंडातून शब्द फुटेना. डोळ्यातून घळघळ अश्रुधारा वाहू लागल्या.

समोर भवेश सर उभे होते. आता त्यांचा चेहरा निर्विकार झाला होता. शांतपणे ते म्हणाले, “तू खोटं बोलतोयस, हे समजूनही मी पाठयपुस्तकं का घेतली माहीत आहे? तुझी ओळख खोटी असेल, पण तुझ्या डोळ्यातलं कारुण्य, दिवसभराची वणवण, पोटातला आगडोंब आणि तहानेनं व्याकूळ झालेला तुझा जीव – हे सारं तर खोटं नव्हतं. तुझ्या खोटया ओळखीपेक्षा हे वास्तव अनेक पटींनी दाहक होतं.”

अशोक समोर बघतच राहिला. भवेश सरांच्या मागच्या बाजूच्या भिंतीवर ईश्वरचंद्र विद्यासागरांचा फोटो टांगला होता. या वेळपर्यंत अशोकला तो दिसलाच नव्हता. अनिमिष नेत्रांनी तो त्या फोटोकडे बघत राहिला. बघता बघता डोळ्यासमोरच्या सगळ्या गोष्टी दिसेनाशा झाल्या. कुठे काहीही दिसत नव्हतं. हळूहळू ते दोन्ही चेहरे एकमेकात मिसळत एकरूप झालेले त्याला दिसले.

कथा समाप्त

श्री चंचलकुमार घोष यांनी लिहिलेल्या ‘मरुद्यान’ या बंगाली कथेचा भावानुवाद.

अनुवाद – सुश्री सुमती जोशी

मोबाईल ९८३३२२२१०६. ई-मेल आयडी [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवन रंग ☆ मृगजळातील हिरवळ (भाग – 4) (भावानुवाद) ☆ सुश्री सुमती जोशी

सुश्री सुमती जोशी

☆ जीवन रंग ☆ मृगजळातील हिरवळ (भाग – 4) (भावानुवाद) ☆ सुश्री सुमती जोशी ☆

सनातनचं कोणतच बोलणं अशोकच्या कानात शिरत नव्हतं. त्याच्या डोक्यात फक्त एकच नाव घुमत होतं, ‘भवेश सर.’ सनातनकडे पहात त्यानं विचारलं, “भवेश सर कसे आहेत?”

“सज्जन आहेत. इतरही शिक्षक आहेत, पण भवेश सर सांगतील, त्याप्रमाणे सगळे शिक्षक वागतात.”

“बंगाली पुस्तकांचा निर्णय ते घेतात का?”

गप्पा मारता मारता दोघेजण मोठया भिंतीची तटबंदी असलेल्या देवळापाशी येऊन पोचले. खूप विशाल देऊळ. चारी बाजूला व्हरांडा. देवळाचा दरवाजा बंद होता. अशोकनं हात जोडले.

“कोणाचं देऊळ?”

“शंकराचं. आमच्या शाळेचे संस्थापक परमेश्वर मझुमदार. ईश्वरचंद्र विद्यासागर यांचे विद्यार्थी. ते मूळचे याच गावचे, पण कोलकात्याला रहात. तेव्हा इथे एकही शाळा नव्हती. परमेश्वर मजुमदार यांनी स्वत: कमावलेल्या निधीतून वडिलांच्या नावानं देणगी दिली आणि खूप कष्ट करून ही शाळा उभी केली. ते कोलकात्याला मोठया हुद्द्यावर नोकरी करत होते. ती नोकरी सोडून त्यांनी या शाळेची जबाबदारी घेतली. तेव्हा ही शाळा अगदी छोटी होती. शिवाय त्यांनी इथे दवाखाना काढला, देऊळ बांधलं, नदीवर घाट बांधला. अनेक सामाजिक कामात लक्ष घातलं.”

“त्या काळी अशी उदार मनाची अनेक माणसं दिसत असत. आता तशी माणसं कुठायत?”

सनातनने मान डोलावली. ‘खरंच भाऊ तुम्ही बरोबर बोलताय. तेव्हा ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्यासारखे आदर्श शिक्षक होते, म्हणून आदर्श विद्यार्थी तयार होत. आता शिक्षकांनी आपली सारी कर्तव्यं सोडून दिलीयत. त्यामुळे बघता बघता त्यांच्याविषयीचा आदर कमी होऊ लागलाय.”

अशोकला सनातनचं म्हणणं पटलं. शिक्षकांविषयीचा गेल्या दोन वर्षातला त्याचा अनुभवही काही खास नव्हता. सगळ्या मनाला न पटणाऱ्या गोष्टी कराव्या लागल्या होत्या. विद्यार्थ्यांना धाकदपटशा दाखवून पुस्तकं विकावी लागत. शिक्षक कमिशन घेत. इतकं करून पुस्तकं विकली गेली नाहीत, तर सकाळ संध्याकाळ मालकाची बोलणी खावी लागत. नुकतीच घडलेली एक घटना अशोकला आठवली. एका शाळेत पुस्तकविक्री झाली नाही. तरीही न रागावता त्याला मास्तरांच्या कलानं घ्यावं लागलं होतं. त्या शाळेत शेवटी मास्तरांनीच त्याला धीर दिला, ‘आज शुक्रवार. आज पुस्तकं विकली गेली नाहीत, तरी काळजी करू नकोस. उद्या शनिवार. उद्या माझा तास आहे. सोमवारपासून तुझी पुस्तकं विकली जातील.’

अशोक अवाक झाला. या सुशिक्षित लोकांना काही जादू करता येते की काय? गेल्या एकवीस दिवसात एकही पुस्तक विकलं गेलं नाही आणि आता फक्त तीन दिवसात…!

शनी, रवी, सोम यानंतर मंगळवारी संध्याकाळी पुस्तकांच्या दुकानाचा मालक प्रकाशन संस्थेच्या ऑफिसमध्ये हजर झाला, “सर्व पुस्तकं संपली, आणखी लागतील.”

“असं कसं झालं? मास्तरना जादूटोणा अवगत आहे काय?”

कुत्सितपणे हसत दुकानाचा मालक उत्तरला, “तुम्ही शुक्रवारी शाळेत गेला होतात ना? त्यांच्या प्रेस्टीजला धक्का लागला. कमिशनचे पैसे त्यांनी आधीच घेऊन ठेवले होते आणि पुस्तकांची विक्री करता आली नाही. शनिवारी वर्गात गेल्यावर पहिल्या बाकापासून शेवटच्या बाकापर्यंत प्रत्येक मुलाला वेताच्या छडीनं असं मारलं की दुसऱ्या दिवसापासून घाबरत घाबरत मुलं पुस्तकं खरेदी करू लागली.” अशोकला वाईट वाटलं. अपराधीपणाची भावना त्याच्या मनात घर करून राहिली. आज भवेश सरांना भेटताना या आठवणीने त्याच्या मनाचा थरकाप उडाला.

भावविवशतेचं जग तुम्हाला एका विचित्र वळणावर घेऊन जातं. भवेश मास्तरांकडे गेल्यावर आणखी काय करावं लागेल, कोणास ठाऊक!

आपण सरांच्या घरापाशी आलोय’, हे सनातनचे शब्द ऐकून अशोक भानावर आला. “हे भोवताली बाग असलेलं घर आहे ना, तिथेच भवेश सर राहतात. आज घरी सर एकटेच आहेत. सरांची बायको सकाळीच माहेरी गेलीय. तुम्ही खुशाल सरांच्या घरी जा. तुम्हाला काही अडचण येणार नाही. मला दुसऱ्या दिशेला जायचंय.”

रस्त्याच्या कडेला भवेश सरांचं घर. घराच्या चारी  बाजूना मोकळी जागा. घराला मोठा व्हरांडा. चहूबाजूना झाडंझुडपं आणि या सगळ्याला बांबूचं वेष्टण. लहानसं लोखंडी प्रवेशद्वार. कानोसा घेत अशोकनं घरात प्रवेश केला. माणसांची चाहूल लागेना. सगळीकडे शांतता पसरली होती. इकडेतिकडे बघितल्यावर व्हरांडयातल्या खुर्चीवर बसलेली, धोतर नेसलेली, पुस्तक वाचत असलेली एक पाठमोरी आकृती दिसली. पुस्तकामुळे चेहरा नीट दिसत नसला तरी भवेश सरांना ओळखण्यात अशोकची चूक झाली नाही. बॅग खाली ठेवून अशोक हळूहळू पुढे गेला.

क्रमश: ….

श्री चंचलकुमार घोष यांनी लिहिलेल्या ‘मरुद्यान’ या बंगाली कथेचा भावानुवाद.

अनुवाद – सुश्री सुमती जोशी

मोबाईल ९८३३२२२१०६. इ मेल आयडी [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ बोध कथा – स्वामीनिष्ठा ☆ अनुवाद – अरुंधती अजित कुळकर्णी

☆ जीवनरंग ☆ बोध कथा – स्वामीनिष्ठा ☆ अनुवाद – अरुंधती अजित कुळकर्णी ☆ 

||कथासरिता||

(मूळ –‘कथाशतकम्’  संस्कृत कथासंग्रह)

? लघु बोध कथा?

कथा १४ . स्वामीनिष्ठा

विशालपूर नगरात एक राजा होता. तो शूर  राज्यकर्ता होता. धर्माचे पालन करीत  न्यायानुसार प्रजेचे व राज्याचे संरक्षण करीत होता.एकदा त्याला जिंकण्याची इच्छा करणाऱ्या  शत्रूने त्याच्या नगरावर आक्रमण केले.  युद्धात राजाला पराजित व्हावे लागले. या पराजयाचे त्याला अतोनात दुःख झाले. तो  नगराचा त्याग केलेला  व केवळ एकाच मंत्र्याची साथ लाभलेला राजा अरण्यात  आला.   तिथेसुद्धा तो शत्रूच्या भयाने कुठेही अधिक काळ थांबू शकत नव्हता.  काट्याकुट्यातून, तीक्ष्ण दगडांवरून पादत्राणे-विरहित, चालण्यास असमर्थ असलेला, तहान-भुकेने व्याकूळ झालेला, ‘पुढे काय करावे?’ या विचाराने चिंताग्रस्त झालेला तो राजा एका तलावाकाठी विश्रांतीसाठी थांबला. आपल्यावर ओढवलेल्या या घोर संकटातही आपली साथ न सोडता आपल्याबरोबर येणाऱ्या त्या मंत्र्याला पाहून राजाच्या डोळ्यांतून अश्रूधारा वाहू लागल्या व त्याला खूप वाईटही वाटले.

“हे  मंत्रिवर, माझे संपूर्ण राज्य नष्ट झाले. माझे हत्ती, घोडे, रथ, सैन्यही राहिले नाही. माझ्यावर फार मोठे संकट ओढवले आहे. आता मला जगण्याची इच्छाच राहिली नाही. पराजित होऊन अशा मरणयातना भोगण्यापेक्षा जलसमाधी घ्यावी किंवा कड्यावरून दरीत उडी घ्यावी किंवा अग्निप्रवेश करावा असे मला वाटत आहे” अशा प्रकारे विलाप करणाऱ्या राजाचे ते बोलणे ऐकून मंत्र्याचे हृदय विदीर्ण झाले.

राजाला दुःखातून बाहेर काढण्याच्या उद्देशाने मंत्री म्हणाला, “महाराज, कालवशात आपले राज्य नष्ट झाले तरी मरण पत्करणे हा त्यावर उपाय नाही. तेव्हा मरणाचे विचार मनात येऊ देऊ नका. जे आपले शत्रू आहेत तसेच ह्या शत्रूराजाचे देखील शत्रू असणारच. त्यांच्याशी मैत्री करून, युद्धाची सज्जता करून, शत्रूचा पाडाव करून पुन्हा नवे राज्य स्थापित करा. नष्ट झालेले राज्य पुनश्च प्राप्त होत नाही असे मुळीच नाही. अमावास्येच्या दिवशी चंद्राच्या सर्व कला क्षीण होतात. तोच चंद्र पुन्हा शुक्लपक्षात वृद्धिंगत होतोच ना? अशाच प्रकारे आपलाही उज्ज्वल काळ येणार व परमेश्वराच्या कृपेने आपलेही मनोरथ पूर्ण होणारच!”

मंत्र्याच्या ह्या प्रेरणादायी वचनांनी राजाचे नैराश्य एकदम दूर झाले. तो प्रफुल्लित झाला. योग्य प्रयास करून, सर्व सैन्य एकत्रित करून राजा युद्धासाठी सज्ज झाला. युद्धात शत्रूला नमवून पुन्हा राजपदी आरूढ झाला. त्या मंत्र्यासह त्याने चिरकाळ राजेपद उपभोगले.

तात्पर्य –  राजाच्या पदरी बुद्धिमान व निष्ठावान मंत्री असले तर ते ओढवलेल्या संकटांवर योग्य उपायांद्वारे मात करू शकतात.

अनुवाद – © अरुंधती अजित कुळकर्णी

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवन रंग ☆ मृगजळातील हिरवळ (भाग – 3) (भावानुवाद) ☆ सुश्री सुमती जोशी

सुश्री सुमती जोशी

☆ जीवन रंग ☆ मृगजळातील हिरवळ (भाग – 3) (भावानुवाद) ☆ सुश्री सुमती जोशी ☆

अशोक निराश झाला. प्रकाशन संस्थेच्या मालकांचा – माधवरावांचा चेहरा त्याच्या नजरेसमोर तरळला. रात्री जेव्हा मी त्यांच्यासमोर उभा राहीन, तेव्हा ते उपहासानं टोचून टोचून बोलतील, ‘चार दिवसात एकाही शाळेत पुस्तकं खपवता आली नाहीत ना? तुम्ही सगळे एकजात कुचकामी. जा आता.’ असं काहीबाही सांगून बॅग खांद्यावर देऊन मला बाहेरचा रस्ता दाखवतील.

समोर उभा असलेला सनातन ओरडला, “चला बाहेर. आता दरवाजा बंद करायचाय.”

जणू काही घडलंच नाही असं दाखवायचा केविलवाणा प्रयत्न केला अशोकनं. घसा अगदी कोरडा पडला होता, आता आणखी किती पायपीट करावी लागणारेय कोणास ठाऊक?

“इथे कुठे पाणी मिळेल का प्यायला?”

सनातननं निर्विकारपणे उत्तर दिलं, “तीन दिवसांपासून टयूबवेल खराब झालीय. दुरुस्त करावी लागेल.”

“टयूबवेल नाही, माझं नशिबच खराब आहे.”

“कुठून आलात तुम्ही?” काहीशा नरमाईनं सनातनने विचारलं.

“कोलकात्याहून. इथे रामनगर शाळेत आलो होतो. तिथे काम झालं नाही, पण तिथल्या शिपायानं तुमच्या शाळेचं नाव सांगितलं.”

“कसे आलात?”

“नदीच्या काठाकाठानं चालत आलो.”

किती दूरवरून चालत आलाय हा! हा विचार मनात आल्यावर सनातन वरमला.

“एवढं चालल्यावर तहान लागणारच! कळशीत थोडं पाणी शिल्लक होतं. तेही आत्ताच ओतून टाकलं. पाणी नाही, म्हणून तर शाळेला सुट्टी.”

अशोकनं काहीही उत्तर दिल नाही. बॅग घेऊन जिन्यापर्यंत आल्यावर सनातनने विचारलं, “कोणती पुस्तकं घेऊन आलायत?”

“बंगाली व्याकरण. पाचवीपासून दहावीपर्यंतची उत्तम पुस्तकं आहेत.”

कितीतरी शाळांच्या शिपायांनासुद्धा चांगली जाण असते. एकदा प्रयत्न तर करून पाहू या, असा विचार करून अशोकनं विचारलं, “तुम्ही पहाता का ही पुस्तकं?”

“मी शाळेचा शिपाई. मी पाहून काय उपयोग? भवेश सरांबरोबर बोलणी केली पाहिजेत.”

“ते बंगाली भाषा शिकवतात का?”

“हो. या शाळेतले ते सर्वात जुने शिक्षक. परवा आलात की तुम्ही त्यांना भेटा.”

“भवेश सर कुठे राहतात?”

जिन्यावरून उतरता उतरता मध्येच थांबत सनातन म्हणाला, “तुम्ही एक काम करा. इतक्या लांब आलाच आहात, तर भवेश सरांची भेट घेऊन जा. समोरच राहतात ते. आता सर घरीच असतील. मी पाठवलंय, असं सांगायची गरज नाही.”

अशोकला एक चतकोर आशा वाटू लागली. तो पटकन म्हणाला, “तसं काही असलं, तर फारच चांगलं. आज जर काही पुस्तकं देता आली तर बरं होईल. पुस्तकांची माहिती सांगायला हवी असली तर पुढच्या वेळी वर्गात जाऊन सांगीन.”

“मी त्याच वाटेनं घरी चाललोय. तुम्हाला भवेश सरांचं घर दाखवतो.”

दोघं जिन्यावरून खाली उतरले. सनातनने प्रवेशद्वाराला कुलूप घातलं. अशोक शेजारीच उभा होता. उन्हं कलली होती. दमला असला तरी अशोक उल्हासित झाला होता. त्यानं चौकशी केली, “बस स्टॉप इथून किती लांब आहे?”

“मास्तरांच्या घरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर तुम्हाला रिक्षा मिळेल. चार रुपयात तो तुम्हाला कदमगाछी बस स्टँडवर नेऊन सोडेल. तिथली कितीतरी मुलं आमच्या शाळेत आहेत. वास्तविक हीच या परिसरातली सर्वात जुनी शाळा. यंदा शंभर वर्षे होतील आमच्या शाळेला. आमचे मुख्याध्यापक म्हणत होते, शाळेचा शताब्दी उत्सव मोठया प्रमाणार साजरा करायचाय.”

क्रमश: ….

श्री चंचलकुमार घोष यांनी लिहिलेल्या ‘मरुद्यान’ या बंगाली कथेचा भावानुवाद.

अनुवाद – सुश्री सुमती जोशी

मोबाईल ९८३३२२२१०६. इ मेल आयडी [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवन रंग ☆ मृगजळातील हिरवळ (भाग – 2) (भावानुवाद) ☆ सुश्री सुमती जोशी

सुश्री सुमती जोशी 

☆ जीवनरंग ☆ मृगजळातील हिरवळ (भाग – 2) ☆ सुश्री सुमती जोशी 

अशोक खूप चालला होता. सोमेश्वर शाळा अजून किती दूर आहे, हे त्याला समजेना. खेडवळ लोकांना विचारून खरा अंदाज येणं कठीण. एक सायकलस्वार समोरून येताना दिसला. अशोकनं त्याला विचारलं, “सोमेश्वर शाळा किती दूर आहे?”

सायकल चालवता चालवता तो उत्तरला, “लई दूर हाय.”

पाण्याचा एक ओहळ होता. आंब्याच्या एका झाडाची छोटीशी सावली पडली होती. बॅग ठेवून तो मटकन खाली बसला. बायकोनं निघताना न्याहारी आणि पाणी बरोबर दिलं होतं. रोजच देत असे. केव्हापासून तो तहानेनं व्याकूळ झाला होता. बॅग उघडून चाचपडूनही हाती काही लागलं नाही. न्याहारीची पिशवी गेली कुठे? पुस्तकं बाहेर काढून बघितलं. पिशवी कुठेही दिसेना.

क्षणभर विचार केल्यावर त्याच्या लक्षात आलं. प्रकाशनसंस्थेच्या कार्यालयात पुस्तकं घेताना आपण खाण्याची पिशवी बाहेर काढली होती. घाईघाईत ती पुन्हा आत टाकायची राहिली. एखादा दिवस असा काही वाईट उगवतो…असा विचार करत अशोक उठला. ऊन मी म्हणत होतं. भुकेमुळे पोटात खड्डा पडला होता. अशा ठिकाणी एखादं हॉटेल सापडणंही मुश्कील. बस स्टँडपर्यंत तरी असंच चालत राहायला हवं. समोरून एक मध्यमवयीन माणूस येत होता. कदाचित शेतावरचं काम उरकून येत असावा. अशोकनं त्यालाच विचारलं. समोर बोट दाखवत तो उत्तरला, “याच रस्त्यानं सरळ जा.”

हाच रस्ता शाळेकडे कुठे वळण घेतो, ते अशोकला समजेना. आता सरळ चालत राहायचं. कोणाला विचारायच्या भानगडीत पडायचं नाही. चालता चालता शाळेपाशी पोचेन.

उशीर होत होता. रणरणत्या उन्हाचा ताप वाढतच होता. नदीकिनाऱ्याच्या तापलेल्या वाळूवरून येणाऱ्या गरम वाऱ्यामुळे डोळे चुरचुरू लागले होते. डोकं तापलं होतं. अशोक झपाझप पावलं टाकू लागला. समोर झाडापानांच्या आडोशाला वस्ती दिसू लागली. तेच गाव असावं, असं त्याला वाटलं.

नदीच्या काठावरून रस्त्यानं एक वळण घेतलं आणि तुरळक घरं दिसू लागली. सगळी सिमेंटची पक्की घरं. सुखवस्तू लोकांचं गाव आहे तर! दोन वर्षांपासून गावं पालथी घातल्यामुळे आता अशोकला गावात पाय टाकल्याबरोबर त्या गावाची कुंडली मांडता येऊ लागली होती. या गावातली मुलं पुस्तकं खरेदी करू शकतील, अशोकनं अंदाज केला. गावातले रस्ते बरेच रुंद दिसत होते, पण रस्त्यावर फारशी रहदारी नव्हती. एक अद्भुत स्तब्धता वातावणात पसरली होती. जुन्या काळातलं एक घर दिसत होतं, बाजूला तळं. आमराई मोहरली होती. त्याचा सुगंध वातावरणात भरून राहिला होता. आता कोणाला विचारायची गरज नाही. समोरच दिसतंय खेळाचं मोठं मैदान आणि बाजूला शाळेची दुमजली इमारत. भिंतीवर मोठया अक्षरात पाटी लटकावली होती, ‘सोमेश्वर हायस्कूल.’

खेडेगावात शहरासारखी एवढी मोठी शाळा असेल, असं अशोकला वाटलं नव्हतं. या शाळेत नक्कीच खूप मुलं शिकत असतील. आता मात्र कोणी दिसत नव्हतं. सगळीकडे निरव शांतता, स्तब्धता भरून राहिली होती. तो चपापला. शाळा का बरं बंद असावी? इतकं चालून आलो खरा, पण…

तो थबकला. आता मात्र त्याचे प्राण कंठाशी आले. इतक्यात व्हरांडयात कोणाची तरी चाहूल लागली. मुलांना शाळेला सुट्टी असेल, पण शिक्षक शाळेत काम करत असतील. शाळेच्या चारी बाजूला मजबून भिंत आणि समोर लोखंडी दरवाजा. अशोकनं आत डोकावून पाहिलं. दोन्ही बाजूंना मोठा व्हरांडा होता आणि ओळीनं सगळ्या वर्गांचे दरवाजे बंद होते. दुसऱ्या मजल्यावर शाळेचं ऑफिस असावं. समोरच्या जिन्यावरून तो दुसऱ्या मजल्यावर आला. तिथेही तीच निरव स्वब्धता. त्यानं इकडेतिकडे पाहिलं. माणसांचा वावर नव्हता. तेवढयात त्याला समोर कोणाची तरी चाहूल लागली. बॅगेच्या ओझ्यानं त्याच्या पाठीला रग लागली होती. बॅग खाली टेकवून पुढे जाऊन त्यानं मोठयानं विचारलं, “कुणी आहे का तिकडे?”

जवळच्या एका खोलीतून एक मध्यमवयीन, धोतर-शर्ट घातलेला, किरकोळ माणूस बाहेर आला. अशोककडे एकटक पहात त्यानं विचारलं, “कोणत्या प्रकाशनसंस्थेतून आलात?”

“एका छोटया संस्थेतून. आपण कोण?”

“मी सनातन. शाळेचा शिपाई. आज कोणी शिक्षक नाहीत, त्यामुळे आज काम होणार नाही.”
”कोणीच नाही?” अशोकाचा कंठ दाटून आला.

“उद्या सुट्टी आहे. परवा सगळे भेटतील. तुम्ही परवा या.”

क्रमश: ….

श्री चंचलकुमार घोष यांनी लिहिलेल्या ‘मरुद्यान’ या बंगाली कथेचा भावानुवाद.

अनुवाद – सुश्री सुमती जोशी

मोबाईल ९८३३२२२१०६. इ मेल आयडी [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवन रंग ☆ मृगजळातील हिरवळ (भाग – 1) (भावानुवाद) ☆ सुश्री सुमती जोशी

सुश्री सुमती जोशी

परिचय 

  • मायक्रोबायॉलॉजी या विषयात पदवी संपादन
  • नवी क्षितिजे या नियतकालिकासाठी विविध विषयांवर लेखन
  • २००४ साली ‘तीन पाश्चिमात्य लेखिका’ हे पुस्तक प्रकाशित झालं.
  • २००९ साली ‘उत्क्रांती’ हे डार्विनचा उत्क्रांती सिद्धांत सोप्या भाषेत समजावून सांगणारं पुस्तक राजहंस प्रकाशनातर्फे प्रकाशित. राज्य पुरस्कारानं सन्मानित
  • २०१० साली वयाच्या साठाव्या वर्षी बंगाली भाषा शिकले. त्यानंतर अनेक बंगाली कथा अनुवादित केल्या. ‘बंगगंध’ हे अशा कथांचं पुस्तक उन्मेष प्रकाशनातर्फे प्रकाशित. तिलोत्तमा मझुमदार यांनी लिहिलेली ‘वसुधारा’, सुचित्रा भट्टाचार्य यांनी लिहिलेली ‘तुटलेली तार’, स्मरणजित चक्रवर्ती यांनी लिहिलेली ‘आकाशप्रदीप’, चंचल कुमार यांनी लिहिलेली ‘काही जमणार नाही तुला’ या अनुवादित कादंबऱ्या उन्मेष प्रकाशनाच्या मेधा राजहंस यांनी प्रकाशित केल्या. मैत्र, संवाद सेतू, अक्षरधारा, हंस, अंतर्नाद अशा दिवाळी अंकात अनुवादित कथा प्रकाशित.
  • वास्तव्य मुंबईचं पश्चिम उपनगर बोरीवली येथे.

☆ जीवनरंग ☆ मृगजळातील हिरवळ (भाग – 1) ☆ सुश्री सुमती जोशी 

पाठीवर मोठया बॅगेचा बोजा घेऊन अशोक कच्च्या रस्त्यावरून चालला होता. दोन्ही बाजूला हिरवी शेतं. कोवळी कोवळी रोपं वाऱ्यावर डुलत होती. थंडी पळाली होती. वसंताची चाहूल लागल्यामुळे हवेत उबदारपणा आला होता. अशोक घामानं निथळत होता. लहान चणीचा अशोक एका छोटया प्रकाशन संस्थेत पाठयपुस्तकांचा विक्रेता म्हणून काम करत होता. शाळा सुरू होण्याआधी तीन महिने विश्रांतीचं नावही घेता आलं नसतं. सारा दिवस वेगवेगळ्या शाळांमध्ये जाऊन तिथल्या सरांना नवीन पुस्तकांच्या नमुनाप्रती द्यायच्या होत्या.

‘सर, आमची ही पुस्तकं बघता का? इतर पुस्तकांपेक्षा ती वेगळी आहेत.’

बहुतेक सर दोन-चार पानं उलटून गंभीर आवाजात म्हणत, ‘ठेवून जा. मग बघीन.’

‘पुन्हा कधी येऊ, सर?’

‘आणखी कितीतरी पुस्तकं आहेत. चाळायला वेळ लागेल.’

अगतिक होत अशोक पुन्हा प्रश्न विचारी, ‘तरीपण अंदाजे किती दिवसांनी येऊ?’

आता मात्र मान वर करून सर उलट प्रश्न विचारीत, ‘किती देणार?’

‘विक्रीच्या दहा टक्के.’

‘दुसरा एकजण पंधरा टक्के देणारेय.’

‘ठीक आहे, सर. मी पण तेवढेच देईन. शिवाय मी एखादी भेटवस्तूसुद्धा देईन.’

सरांच्या चेहऱ्यावर मंद स्मित झळकतं, ‘बरंय, मग दोन आठवडयांनी ये. काय करता येईल, ते बघतो.’

अशी उत्तरे ऐकल्यावर अशोकला खूप वाईट वाटे. आईवडिलांखालोखाल प्रत्येक माणसावर ऋण असतं शिक्षकांचं. म्हणून तर…सुरुवातीला तोसुद्धा हे ऋण मानायचा, पण आता मात्र तसं होत नाही. त्याच्या प्रकाशनसंस्थेची पाठयपुस्तकं जिल्ह्यातल्या पाच शाळांमध्ये लावण्यात तो यशस्वी झाला होता. आणखी दोन-चार शाळांमध्ये तरी आपल्या पाठयपुस्तकांची वर्णी लावली पाहिजे, नाहीतर नोकरीवर केव्हा गदा येईल, ते सांगता येणार नाही, असं तो मनाला पुन:पुन्हा बजावत होता. पूर्वीची गोष्ट वेगळी होती. आई आणि मुलगा, दोन तोंडाची व्यवस्था करावी लागे. गावच्या घरी जे काही थोडंफार असेल, त्यावर भागवता येत असे. पण सहा महिन्यांपूर्वी लग्न केलं आणि  जबाबदारी एकदम कशी वाढली, ते अशोकच्या लक्षात आलं नाही.

पायाबरोबर मनातली विचारचक्रंही वेगानं फिरू लागली. गेले तीन दिवस पायपीट करत होता, पण एकाही शाळेत पुस्तकं खपवता आली नव्हती. सकाळीही तो एका शाळेत गेला होता, पण प्रवेशद्वारापासून शिपायानं ‘आमची पुस्तकांची व्यवस्था झालीय. आता आणखी पुस्तकं घेता येणार नाहीत.’ असं सांगून त्याला परतवून लावलं.

बस स्टँडपासून चालून चालून अशोक दमला होता. खेडेगावातल्या शाळांना भेटी देणं काही सोपं नव्हतं. बस मिळत नसे, रिक्षा नाही, सायकल मिळाली तर ठीक, नाहीतर टांगा टाकत चालत राहायचं! अशोकनं धप्प करून बॅग खाली टाकली आणि तो मटकन खाली बसला.

कशी कोणास ठाऊक, पण शिपायाला त्याची दया आली. म्हणाला, ‘तुला सोमेश्वर हायस्कूल बघता येईल.’

‘किती लांब आहे?’ अशोकनं विचारलं.

डांबरी रस्त्यानं गेलास तर खूप लांब आहे. पण नदीच्या काठानं गेलास तर लवकर पोचशील. मोठी शाळा आहे. खूप मुलं शिकायला येतात तिथे.’

दोन वर्षांपासून पाठयपुस्तकांच्या प्रचाराचं हे काम चालू होतं. सोमेश्वरनाथ शाळेचं नाव ऐकलं होतं, पण तिथे जायचं सुचलं नव्हतं. बॅगेचं ओझं पुन्हा एकदा खांद्यावर टाकून अशोक चालू लागला. थोडं पुढे गेल्यावर रस्त्यानं वळण घेतलं. माळरानातून जाणारी पायवाट. आजूबाजूला फारशी वस्ती नव्हती. एका बाजूला शेतं, कोवळ्या रोपांमुळे सगळीकडे हिरवगार दिसत होतं. दुसऱ्या बाजूला झाडापानांच्या पलीकडे दामोदर नदीचं पात्र दिसत होतं. नदीला फार पाणी नव्हतं. पाण्यापेक्षा वाळूच जास्त होती. उन्हात चमचम करत होती. पलीकडच्या तीरावर दूर अंतरावर झाडाझुडपात लपलेलं गाव दिसत होतं. नदीचं पाणी नागमोडी वळणं घेत वाहात होतं. कुठे कमी, कुठे जास्त. अनेक दिशांना पसरलं होतं. पात्रात मध्येमध्ये पाण्यात इंग्रजी व्ही अक्षरासारखे बांबूचे खुंट रोवून ठेवले होते. मासे जाळ्यावर आपटून व्हीच्या कोपऱ्यात गोळा होणार. एक कोळी जाळं टाकून मासे गळाला लागायची वाट बघत होता. जवळच्या काठीवर बसून पक्षी आशेनं जाळ्याकडे डोळे लावून बसला होता. एखादा तरी मासा मिळायची अधीर होऊन वाट बघत होता. अशोक थबकला. त्या दृष्याकडे काही काळ बघत राहिला आणि मनाशी काहीतरी पुटपुटत पुढे चालू लागला.

 क्रमश: ….

श्री चंचलकुमार घोष यांनी लिहिलेल्या ‘मरुद्यान’ या बंगाली कथेचा भावानुवाद.

अनुवाद – सुश्री सुमती जोशी

मोबाईल ९८३३२२२१०६. इ मेल आयडी [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ अनुवादित लघुकथा – सुवार्ता ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

 

 

 

 

☆ जीवनरंग ☆ अनुवादित लघुकथा – सुवार्ता ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ 

आजी गुरुप्रीतकौरचा ताप उतरतच नव्हता. त्यांची सून ज्ञानप्रीत हिने डॉ सतवीर सिंह यांना सांगितलं  की, “डॉ. ह्या ना कुणाचंच अजिबात ऐकत नाहीत. काल रात्री त्या गच्चीवर कधी गेल्या, आणि तिथेच अंथरूण घालून,रजई लपेटून कधी झोपल्या, हे घरातल्या कुणालाच कळलंही नाही. सकाळी उठल्यावर विचारलं तर म्हणाल्या की “अगं दिल्ली बॉर्डरवर इतक्या थंडीत आणि सलग इतके दिवस,हे आणि कीरतबेटा उघड्यावर कसे झोपत असतील?”

डॉ. सतवीर त्यांचे फॅमिलीडॉक्टर होते. त्यांनी आजीला तपासलं तर त्यांच्या अंगात खूप ताप होता. पूर्ण शरीर थरथर कापत होतं. तापाचं कारण कळल्यावर ते म्हणाले “मी औषधं लिहून देतो, ती आणून यांना द्या . ठीक होईल सगळं.” आणि आजीला बजावलं–”आजी, आता अंथरुणातून अजिबात उठायचं नाही. आणि काळजीही करायची नाही. तिथे खूप माणसं आहेत एकमेकांची काळजी घेण्यासाठी.”

थंडीने कुडकुडत आजी म्हणाली–”अरे बाळा,पण मी टीव्हीवर पाहिलंय, की दिल्ली बॉर्डरवर खूप बॅरिकेड्स लावलेत, पोलिसांच्या तुकड्या तैनात आहेत. शिवाय अश्रूधुराची नळकांडी, पाणी याचीही व्यवस्था दिसतेय.”

त्यावर डॉक्टरांनी समजावलं, “आजी ती दिल्ली-बॉर्डर आहे. वाघा-अटारी बॉर्डर नाहीये. आणि बॅरिकेडच्यापलीकडे पोलिसांच्या ज्या तुकड्या आहेत,त्यात सगळे आपले भाऊबंदच तर आहेत. काळजी करू नका. लवकरच चांगली बातमी मिळेल.”

पण यामुळे आजीचं मन थोडंच शांत होणार होतं?आणि त्यांना काळजी वाटणंही स्वाभाविकच होतं. आजोबांची बायपास-शस्त्रक्रिया झालेली होती. शिवाय त्यांच्या लग्नाला पन्नास वर्षे होऊन गेली असली तरी,लग्न-कार्य, आणि कुणा नातेवाईकाचे निधन, याव्यतिरिक्त ते दोघे एकमेकांपासून असे लांब कधीच राहिले नव्हते—-त्यांचा नऊ वर्षांचा नातू गुरमीत आपल्यापरीने आजीची सेवा करत होता. मागेल ते पळत जाऊन आणून देत होता. आजी जेवल्याशिवाय त्याच्या घशाखाली घास उतरत नव्हता.

ज्ञानप्रीत बघत होती–जेव्हापासून गुरमीतचे आजोबा सरदार गुरुशरणसिंह, आणि वडील सरदार कीरतसिंह, दोघेही गावातल्या इतर लोकांबरोबर दिल्लीला गेले होते, तेव्हापासून त्याचा चेहेरा कोमेजल्यासारखा झाला होता. त्याच्या अजीतकाकांच्या घरीच आपल्या इतर मित्रांसोबत तो दिवसभर रेंगाळत रहायचा.

आज आजी तापाच्या ग्लानीत दिवसभर सारखी काहीतरी बडबड करत होती—”विचित्रच आहे सगळं…… प्रजासत्ताक राष्ट्र म्हणे….. लोकांनी इतक्या जागांवर यांना जिंकून दिलंय…… ,आणि लोकांच्या भल्यासाठी, लोकांना हितकारक असणारे कायदे करण्याचा हक्कही दिलाय…..पण हक्कासाठी लढण्याच्या हक्काबरोबर, राजकारणही खेळण्याचा हक्क नाही दिलाय….. राजकारण काय? काल टेबलाच्या या बाजूला होतं….. आज टेबलाच्या त्या बाजूला आहे…. उद्या पुन्हा या बाजूला येईल…… एक मुलगा देशाची सेवा करण्यासाठी आहे… त्याला करू दे देशसेवा…. एक या मातीची सेवा करण्यासाठी आहे…. त्याला मातीची सेवा करू दे….”आपल्या नवऱ्याच्या  आणि मुलाच्या आठवणीने ती अस्वस्थ झाली होती. गुरमीतला मात्र त्यातलं काहीच समजत नव्हतं… प्रजासत्ताक… कायदे… हक्क… राजकारण… हे शब्द त्याला विचित्रच वाटत होते. एव्हाना संध्याकाळ झाली होती. जरा वेळाने आजीचा ताप थोडा उतरला, आणि गुरमीत मित्रांसोबत पळतच अजीतसिंहांच्या घरी पोहोचला.

सासूची प्रकृती सुधारलेली पाहून ज्ञानप्रीतला बरं वाटलं. दिवसभरात दोनदा किरतसिंहचा फोन आला होता, पण तिने त्यांना काहीही सांगितलं नव्हतं. तितक्यात सासूने तिला हाक मारली…” ज्ञानप्रीत, यांना जरा फोन लावून दे. मला त्यांच्याशी बोलावसं वाटतंय.”

ती काही बोलणार, इतक्यात गुरमीत पळत आला.स्वयंपाकघरातून त्याने थाळी आणि चमचा आणला. आजीच्या खोलीतून टॉर्चही आणला. आणि तो गच्चीवर जायला लागला…. “अरे गुरमीत काय झालं? सांग तरी आम्हाला..”आजीने विचारलं .

“आजी, जोपर्यंत आजोबा त्यांचं म्हणणं पटवून देऊन परत येणार नाहीत, तोपर्यंत मी आणि माझे मित्र रोज संध्याकाळी सात वाजता एक मिनिटभर चमच्याने थाळी वाजवणार  आणि एक मिनिट टॉर्च लावून ठेवणार….”गुरमीतने पळतापळताच सांगितलं.—–हे ऐकताच त्या दोघी हतबलपणे एकमेकींकडे पहात राहिल्या…..त्याच्या बोलण्याचा मनातल्या मनात   आपापला अर्थ लावत राहिल्या—-.

मूळ हिंदी कथा : श्री हेमन्त बावनकर

अनुवाद :  सुश्री मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ अजि म्या भूत पाहिले…. भाग-5 ☆ सौ ज्योती विलास जोशी

सौ ज्योती विलास जोशी

☆ जीवनरंग ☆ अजि म्या भूत पाहिले…. भाग-5 ☆ सौ ज्योती विलास जोशी

(करोनाचं हे दुसरं भूत….)

आता भूतही इरेला पेटलं…..

“भूत म्हणालं, मीच करोना भूत आहे.”

मी हादरलो. ज्या विठुरायाकडे याच करोनाला नष्ट कर म्हणून आम्ही वारकरी साकडं घालतोय त्याचीच तक्रार मी करोनाकडे केली.

काय करून बसलो मी हे? आता विठुराया माझ्यावर नक्कीच रुसणार! मी अगदी दिग्मूढ झालो!”

“अरे बापरे! काय करायच रेआता?” आम्ही तिघांनी पाटणकरला आणखी संकटात टाकलं.

“मी भुताच्या हाता पाया पडू लागलो. विनवणी करू लागलो. काही चुकलं असेल तर माफ कर म्हणून आर्जव करू लागलो.

त्यावर ते म्हणालं,माझ्याकडे एक करारनामा आहे.त्यावर अखिल मानवजातीची सही हवी आहे ती घेऊन दे, मग मी जातो.

मी करारनामा वाचला आणि क्षणाचाही विलंब न लावता सर्वांच्या वतीने सही केली.

भुताची माझ्या मानेवरची हाताची पकड सैल झालीआणि ते गडगडाटी हास्य करीत छूमंतर झालं. मीही पळत सुटलो.”

“अरे पण होतं तरी काय त्या करारनाम्यात ? पूर्ण वाचलास का करारनामा? कशावर सही करून आलास?” पाटणकर स्वप्न वर्णन करतो आहे हे आम्ही एव्हाना विसरलो होतो. आम्हा सर्वांच्याच मनामध्ये प्रश्नांचे काहूर माजलं होते.

“वृक्षवल्लीशी सोयरीक करा, प्रदूषणविरहित हवा राखण्यासाठी पर्यावरणाचे रक्षण करा, प्राणी मात्रांवर दया करा, निसर्गाशी मिळतेजुळते घ्या हे आणि असे बरेच मुद्दे त्यात होते.”

“आणि तू सही केलीस?”

“होय, पर्यायच नव्हता दुसरा! कधी माझी या भुतापासून सुटका होते असू झालं होतं मला. मी त्या करारनाम्यावर सही केली आणि सुटकेचा श्वास सोडला. ‘करोना गेला, करोना गेला’ असे ओरडत सुटलो जणू हर्षवायू झाला होता मला.”

“मग?”

“अरे, मग काय? मला कोणीतरी जोरजोरात हलवत होतं…. आणि म्हणत होतं…… उठा! आज आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळी सकाळी त्या दळभद्री, कपाळ करंट्या करोनाच नाव कशाला घेताय ? विठुरायाला आळवा. उठा!”

“मग?”

आमचं ‘मग’ काही संपेना. पाटण्या बोलतच राहावा असं वाटत होतं. “मग काय……  उठलो तर साक्षात रुक्मिणी डोळ्यासमोर! आणि रेडिओवर आशाताई गात होत्या…….

‘अजि म्या ब्रह्म पाहिले.’

समाप्त

© सौ ज्योती विलास जोशी

इचलकरंजी

मो 9822553857

[email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ बोध कथा – तीन मासे ☆ अनुवाद – अरुंधती अजित कुळकर्णी

☆ जीवनरंग ☆ बोध कथा – तीन मासे ☆ अनुवाद – अरुंधती अजित कुळकर्णी ☆ 

||कथासरिता||

(मूळ –‘कथाशतकम्’  संस्कृत कथासंग्रह)

? बोध कथा?

कथा १३ . तीन मासे

एका नदीच्या खोल जलाशयात  तीन मासे राहत होते.  त्या तिघांपैकी एका बुद्धिमान माशाने  पाण्याची स्थिती लक्षात घेऊन यापुढे जलाशयात  पाणी राहणार नाही  हे जाणले.  त्याने त्या दोघा माशांना बोलावून सांगितले की “ उन्हाळ्यात या जलाशयातील पाणी कमी होईल तेव्हा कोळी येऊन  जाळे पसरवून  आपल्याला पकडतील व ठार मारतील. तेव्हा आपण जर प्रवाहाबरोबर हळूहळू दुसऱ्या जलाशयाकडे किंवा  समुद्राकडे गेलो तरच आपले प्राण वाचतील. इथेच  राहिलो तर संकटे ओढवतील.” बुद्धिमान माशाचे बोलणे ऐकून इतर दोघे त्याला हसले व त्यांनी त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले. तेव्हा तो मासा एकटाच ते  जलाशय सोडून प्रवाहाबरोबर दुसऱ्या जलाशयात गेला.

काही काळानंतर उन्हाळा आल्यावर जलाशयाचे पाणी कमी कमी होऊ लागले.तेव्हा ही संधी साधून एक कोळी तेथे आला. त्याने जाळे पसरवून त्या दोघा माशांना पकडून जलाशयाच्या तीरावर आणले.  त्यातील एक मासा एक उपाय करून स्वतःला मृतवत् भासवत निश्चल राहिला.  दुसरा मात्र वारंवार उड्या मारत होता.  तेव्हा  कोळ्याने त्याच्यावर आघात करून त्याला मारले. कोळी दूर गेलेला दिसताच   तो पहिला मासा हळूहळू जलाशयापर्यंत  सरकून झटकन उडी मारून त्यात प्रवेश करून सुरक्षित राहिला.

तात्पर्य – भविष्यात येणाऱ्या संकटांचा आधीच विचार करणारा सहज सुखी होतो. संकट आल्यावर बुद्धिबलाने योग्य उपायांनी प्रतिकार करणाऱ्याला  सुखप्राप्ती होते.  दैवावर अवलंबून  राहिल्याने अनभिज्ञ व्यक्तीचा विनाश होतो.

अनुवाद – © अरुंधती अजित कुळकर्णी

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ अजि म्या भूत पाहिले…. भाग-4 ☆ सौ ज्योती विलास जोशी

सौ ज्योती विलास जोशी

☆ जीवनरंग ☆ अजि म्या भूत पाहिले…. भाग-4 ☆ सौ ज्योती विलास जोशी

(करोनाचं हे दुसरं भूत….)

पाटणकर पोटतिडकीने सांगत होता……

“भूत दादा,आई-बापाविना आम्ही भावंडे!मोठ्या प्रेमाने भावाने आम्हाला इथवर आणले. उच्चशिक्षित झालो,डॉक्टर झालो. आता गावात राहून कसं चालणार ?पोटापाण्याचं काही बघू की नको? पण खरं सांग, सेवाच करतोय ना रे मी सर्वांची ? मग, विठू का रुसला ? वारी का नको म्हटला?” असे म्हणून पाटणकर रडू लागला. आम्ही त्याला सावरलं.  आत्ता कुठे पाटणकर खरं खरं बोलायला लागला होता.

“मग तुझी सुटका कशी झाली?” मी मुद्द्याचा प्रश्न विचारला.

“अरे काय सांगू तुम्हाला?” असे म्हणून पाटणकरचे डोळे चमकले. आम्ही त्याला नकळत हरभऱ्याच्या झाडावर चढवले होते.

“भूतच मला सांगू लागले; अरे तुझा विठू ना परवा मला तुझ्या सोबतच दवाखान्यात दिसला. तो पीपीई किट घालून अगदी आम्हा भुतांसारखा  दिसत होता. तुझ्या बरोबरीने काम करत होता तो! तूहि त्याला ओळखलंच नाहीस. आम्हा सारखी अशी अनेक भूतं मानव सेवेत लागली आहेत. भुतासारखच काम करतात सगळे. त्यात तूहि आहेस. काय सांगतोस? तुला कसे ठाऊक की विठुराया माझ्यासोबत होता ते? मी भुताला विचारले.

अरे, मला नंतर भेटला तो आणि  म्हणाला,यंदा मानवजातीवर कसलेसे संकट आले आहे म्हणे! त्यानं अनेक माणसे आजारी पडायला लागली आहेत त्यामुळे दवाखान्यात काम प्रचंड वाढलं आहे.

माझे वारकरी अथक काम करताहेत. देशाचे पंतप्रधानही अहोरात्र काम करतातहेत. सर्वजण त्यांच्या सादेला प्रतिसाद देत आहेत. पण हात अपुरे  पडायला लागलेत रे!
मी ठरवलं, यंदा आपणच मदतीलाधावून जायचं भक्तांच्या. तेवढाच खारीचा वाटा! पंढरी सोडून इथेच आलो आहे मी! म्हणून माझ्या वारकऱ्यांना भक्तांना मी वारीला येऊ नका,कायिक नाही तर मानसिक वारी करा असं म्हणालो.

बरं, सर्वांना चंद्रभागा रुसली आहे असे का बरं वाटलं? ती तर दुथडी भरून वाहते आहे व सगळ्यांना आलिंगन द्यायला उत्सुकआहे.सगळ्या वारकऱ्यांनी उगाच गैरसमज करून घेतला आहे झालं.

बाबा रे, मग तू का माझ्या मानगुटीवर बसला आहेस ?का माझा पिच्छा पुरवतो आहेस? काय हवय तुला? मी भुताला मार्मिक प्रश्न विचारला.”

सडेतोड स्वभावाच्या पाटणकर कडून स्वप्नातही असा बिनधास्त जाब विचारणं अपेक्षितच होतं. उत्सुकता होती ती भुताच्या उत्तराची!…….

क्रमशः….

© सौ ज्योती विलास जोशी

इचलकरंजी

मो 9822553857

[email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

 

Please share your Post !

Shares