मराठी साहित्य – विविधा ☆ सोहळा मेणाच्या पुतळ्यांचा… लेखिका : सुश्री ऋचा सुनील पारेख ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर ☆

? विविधा ?

☆ सोहळा मेणाच्या पुतळ्यांचा… लेखिका : सुश्री ऋचा सुनील पारेख ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर 

सगळ्यांच्या आकर्षणाचा विषय ,,’वेलेन्टाइन डे’! वेलेन्टाइन डे हा शब्द काही वर्षांपूर्वी भारतात फारसा परिचित आणि प्रचलित नव्हता.आता मात्र ढिगाने ढिगारे जन्माला आलेत ह्या वेलेन्टाइनचे पोवाडे गायला!

आपल्या देशात प्रेमाची व्याख्या समर्पणाने सुरू होऊन भक्तीवर विसावते.परंतु दुर्भाग्य आपलं की ,आपण वेगाने आधुनिकीकरण नावाचा गुळगुळीत दाखला घेऊन पाश्चत्यांचे अंधानुकरण करण्यात बुडालेले ,नव्हे धुंद झालो आहोत.बुडणारा कधीतरी हातपाय हलवतो,पण धुंद झालेल्यांची तर मतीच गुंग असते.

असं म्हटलं जातं की,14 फेब्रुवारी 269 मध्ये संत वेलेन्टाइनला मारण्यात आलं. आणि त्या दिवसाला वेलेन्टाइन डे नाव दिलं गेलं.

राजा कलाउडियस ला सैनिकांचे प्रेम किंवा लग्न मान्य नव्हते  कारण त्यामुळे त्यांची एकाग्रता भंग होते असं त्याला वाटायचं, आणि वेलेन्टाइनने याचा विरोध केला म्हणून त्याना मारण्यात आलं हे एक कारण.दुसरं वेलेन्टाइन बंदी असताना कारागृहात त्यांना जेलरच्या मुलीशी प्रेम झालं .हे समजल्यावर त्यांना फाशीची शिक्षा ठोठावली. त्याच्या आदल्या रात्री त्यांनी प्रेयसीला जे पत्रं लिहिलं त्यात युअर वेलेन्टाइन  असं लिहिलं त्यानंतर हा वेलेन्टाइन डे सुरू झाला.

रोम संस्कृती हे मानते ते ठीक आहे,पण आपण का म्हणून तो दिवस साजरा करतो?तर म्हणे प्रणय दिवस आहे,प्रेमाचा दिवस आहे.आता ह्या भारतीय विलायती गाढवांना कोण सांगेल की वसंत पंचमी काय आहे ?तर जातील लगेच गुगलबाबाच्या गुहेत!

ज्या देशातल्या युवापिढीला साधं गणतंत्र दिवस म्हणजे काय?रावण महाभारतात होता की रामायणात? हे माहीत नसतं त्यांना वेलेन्टाइन डे चा पूर्ण इतिहास माहीत असतो.दोष त्यांचा नाही आपला आहे.लेखक वृत्तपत्र, संपर्क माध्यमं हे खरे तर समाजाचा आरसा असतात.निदान त्यांनी तरी आपण भारतीय असल्याची जाणीव ठेवावी.

हग डे, चॉकलेट डे, प्रॉमिस डे, किस डे, काय निष्पन्न होतं त्यातुन? आणि कुठले आदर्श तुम्ही निर्माण करता?हे करतांना कुठेतरी आतलं मन बोचणी देत असतं,हे योग्य नव्हे सांगून, मग ती सल लपवण्यासाठी मग हग डे ला शिवाजीराजे अफजलखान मिठीची उपमा द्यायची.प्रॉमिस डे ला बाजीप्रभूच्या पावनखिंडीची झालर लावायची.लाज वाटायला हवी देशासाठी लढणाऱ्या राष्ट्रपुरुषांना इतकं स्वस्त करतांना!

आणि आपल्या संस्कृतीत सगळे दिवस आहेत की साजरे करायला,पूर्वजांसाठी पितृपक्ष,प्रेमासाठी वसंत पंचमी,भावासाठी रक्षाबंधन, पतीसाठी करवा चौथं,गुरुसाठी गुरू पौर्णिमा, एकेक दिवस प्रेम,कृतज्ञता,समर्पण,आणि संस्कारांनी परिपूर्ण आहेत. एकाच दिवशी सगळ्यांचा भाजीपाला करून खाणे निव्वळ बाजारीकरण आहे.त्यांची कदाचित ती संस्कृती असेल त्यांनी ती जोपासावी.कुठल्याही संस्कृतीला विरोध नाही पण भारतात त्याची गरज आहे का?

वसंतोत्सव प्रेमाचं प्रतीक नाही का? साक्षात सरस्वती कृष्णावर मोहित होऊन त्याला पतिरुपात स्वीकारण्याची इच्छा प्रकट करते तेव्हा कृष्ण स्वतःला राधेच्या प्रति समर्पित असल्याचे सांगून,सरस्वतीला प्रसन्न करण्यासाठी वरदान मागतो आणि पंचमीला देवीची पूजा करतो.हे असतं प्रेम!ही असते आस्था! आजच्या भाषेत सांगायचं तर ही असते कमिटमेंट!

संस्कृती प्रत्येक देशाला असते.कुठल्याही धर्म किंवा संस्कृतिला माझा विरोध नाही,तसेच विदेशी संस्कृती आपल्या देशात शेवाळासारखी पसरू द्यावी याला समर्थनदेखील नाही

वेलेन्टाइनला विरोध केला तर आम्ही जुनवाणी आणि तुम्ही मानता म्हणजे पुरोगामी ,असं होतं नसतं.

आपण जे काही करतो त्यातून काय निष्पन्न होतं हे महत्त्वाचं आहे.वेलेन्टाइनच्या नावाखाली मोकाटपणे वावरणं,महागडी गिफ्ट्स देणं घेणं,वारेमाप पैसा पार्ट्यांमध्ये घालवणं, हे अंधानुकरण किती अंधगर्तेत आपल्याला ढकलतंय याची तसूभरही कल्पना येत नाही खरंच खंत वाटते.आपल्या या मूर्खपणाचा पुरेपूर वापर मल्टिनॅशनल  कंपनीत असलेले शकुनी मनसोक्तपणे करून घेतात.चामडी आणि दमडी चा व्यापार म्हणजे असले सो कोल्ड डे…

बरं! वेलेन्टाइन डे अगदी आठ वर्षाचं पोर ही सांगू शकेल,कारण त्याच्या कानावर तेच पडतं आणि दृष्टीस तेच!त्यात त्याचा दोष नाही.आपण कारणीभूत आहोत.किती जणांना भगतसिंग, राजगुरू,सुखदेवला कोणत्या दिवशी फाशी दिल्याचं आठवतं?अरे तुमचे सगळे डे(निरर्थक) तर या तिघांनी जगून दाखवले.

१) हग डे-हसत हसत मृत्यूला कवटाळले.

2) प्रॉमिस डे-देशाला गुलामगिरीतून सोडवण्याची प्रतिज्ञा केली

3) टेडी डे-इंग्रजांना खेळणं बनवून सोडलं

4) चॉकलेट डे-मेरा रंग दे बसंती चोला म्हणत देशप्रेमाची गोडी लावली

5) किस डे-देशाच्या रक्षणासाठी भूमातेचे चुंबन घेऊन शपथ घेतली.

जर वेलेन्टाइनला फाशी दिल्याचा दिवस इतक्या उत्साहाने साजरा करता तर 23 मार्च हा ‘शहीद  दिन’ केवळ कागदोपत्री का? आपला शहीददिन किती देश साजरे करतात?

हे लिहिताना देखील रक्त उसळतंय आणि डोळे पाणावतात आहे ज्या देशात मृतात्म्यांच्या छायाचित्रासमोर पणती लावण्याची प्रथा आहे त्याची जागा आता मेणबत्त्यांनी घेतली.आपल्याकडचे वैभव सोडून दुसरीकडून उसने घेण्यात कुठली बुद्धिमत्ता दिसते तेच कळत नाही.मेणबत्त्या लावत लावत आपणही मेणाचे होत आहोत हे समजतच नाही का?वाढदिवस काय तर मेणबत्त्या विझवून करायचे.अरे आपल्या संस्कृतीमधले संस्कार बाजूला सारून का पाश्चात्यांच्या पायाशी लोळताय बाबांनो!मेणाचे पुतळे होऊनच जगा मग!जिथे एखाद्या विचाराची गर्मी मिळाली तिथे वितळले,जिथे नर्मी मिळाली तिथे घट्ट झाले.आचरण मेणासारखं, आदर्श मेणासारखे,आणि अस्तित्वही मेणासारखे!

त्यांच्या नकलाच करायच्या असतील तर शिस्तीच्या करा, टेक्नॉलॉजीच्या करा,वेळेच्या सदुपयोगाच्या करा,राष्ट्रविषयीच्या प्रेमाच्या करा,उत्तम बाबींचे अनुकरण करता येत नाही,तिथे भिंतीवरच्या पिचकाऱ्या आदर्श वाटतात!

क्षणाक्षणाला विरघळणाऱ्या मेणबत्त्यांचीं नाही,तर कोरीव काम करून रेखीव शिल्प साकार होऊ शकेल अशा पाषाणांची देशाला गरज आहे.जे अक्षत असतील, अटल असतील,त्यांचीच वंदना होते!त्यातूनच इतिहास सर्जतो!

हात जोडून कळकळीची विनंती आहे,देशासाठी फार काही करू शकत नसाल तर निदान स्वतःला आणि भावी पिढीला इंग्रजाळलेल्या अवस्थेत जगण्यापासून परावृत्त करा.इतकं केलं तरी भारतीय असल्याचे सार्थक होईल.

नाहीतर आहेच उद्यापासून ‘तेरी मेरी प्रेम कहाणी

मी तुझा राजा तू माझी राणी

बाकी सगळं पालथ्या घड्यावर पाणी…

*********

लेखिका : सुश्री ऋचा सुनील पारेख

संग्रहिका: सौ.बिल्वा शुभम् अकोलकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ जीवन एक नाटक… भाग-१ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली ☆

श्री व्यंकटेश देवनपल्ली

? जीवनरंग ❤️

☆ जीवन एक नाटक… भाग-१ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली

नुकतीच माझी बदली कोयंबत्तूरहून नवी दिल्लीला झाली होती. मी कुणाशी तरी फोनवर मराठीत बोलत होतो. आधीच केबिनमध्ये येऊन बसलेला आकाश व्यास माझे बोलणे लक्षपूर्वक ऐकत होता. संभाषण संपताच त्याने मला विचारलं, “सर, अभी आप मराठी में बोल रहे थे ना?” 

मी होकारार्थी मान डोलावली. त्याच्या चेहऱ्यावर एक अनामिक आनंद दिसला. “सर, आज शामको आप मेरे घर दस मिनिट के लिए आएंगे तो बडी कृपा होगी। मेरा घर यहाँ से बहुत नजदीक है।” त्याच्या आवाजात कणव भासली. 

“सर, आपने कभी रघुवीरप्रसाद धीरजजी का नाम सुना है?” आकाशनं विचारलं. 

“क्यूं नही? वे हिंदी के बडे साहित्यकार है.” असं म्हणताच आकाश शांतपणे म्हणाला, “सर, वे मेरे ताऊजी है, मैं आपको उनसे मिलवाना चाहता हूं। वे बहुत साल मुंबई में रह चुके है, मेरी बडी मम्मी भी महाराष्ट्रीयन थी।”         

संध्याकाळी आकाशच्या घरी गेलो. वरच्या मजल्यावरच्या एका छोट्याशा खोलीत कोपऱ्यातल्या सोफ्यावर अंग दुमडून, पुस्तकात डोकं खुपसून एक वृद्ध गृहस्थ बसले होते. 

“ताऊजी, ये हमारे बडे साहब श्रीकांतजी है। वे पूना के रहनेवाले है।” असं आकाशने सांगताच धीरजजींनी हलकेच पुस्तकातून डोकं वर काढत मला पाहिलं. मी समोरच्या खुर्चीवर बसलो. 

“आप मराठी जानते ही होंगे?” मी होकारार्थी मान डोलावताच धीरजजींच्या चेहऱ्यावरच्या भावना हळूहळू बदलत गेल्या. 

रघुवीरप्रसाद म्हणजे हिंदी साहित्यातले एक बडे प्रस्थ होते. त्यांच्या नांवावर गाजलेली चार नाटके, दोन कादंबऱ्या, कित्येक कथासंग्रह होते. 

चहा आणण्यासाठी आकाश खाली गेला. प्रश्न विचारल्याखेरीज संवाद सुरू होऊ शकत नाही म्हणून मी धीरजजीना विचारलं, “तुम्ही मुंबईत कधी होता? कशी वाटली मुंबई?”

धीरजजी क्षीण आवाजात अस्खलित मराठीत म्हणाले, “मुंबईवर माझं प्रेम जडलं होतं. माझी पत्नी मुंबईचीच होती आणि……” त्यांच्या तोंडातून पुढचे शब्द बाहेर पडले नाहीत. त्यांचा आवाज घोगरा झाला. मी त्यांच्या वर्मावर बोट ठेवल्यासारखं झालं.  

“तुम्ही लिहिलेलं ‘बहुत याद आओगे’ हे नाटक मी वाचलं आहे. मला खूप आवडलं.” असं सांगताच धीरजजी स्वत:ला सावरत म्हणाले, “हे पाहा, आधे अधूरे, आषाढ का एक दिन, म्हटलं की लोकांना मोहन राकेश आठवतात. हयवदन, तुघलक म्हटलं की गिरीश कर्नाड आठवतात. हिंदी नाटकांच्यासारखं मराठी नाटकांचं नाही. 

मराठी नाटकांच्या लेखकाची नावे पटकन आठवत नाहीत. त्याच लेखकाच्या प्रतिभासंपन्न लेखणीतून उतरलेल्या संवादाला आपल्या अभिनयाच्या कोंदणात बसवून सादर करणारा अभिनेता किंवा अभिनेत्री आठवतात. गारंबीचा बापू म्हटलं की तो घाऱ्या डोळ्यांचा, लालबुंद चेहऱ्याचा डॉ. काशिनाथ घाणेकर समोर उभा ठाकतो. संभाजीराजे म्हणजे उंच, धिप्पाड शरीरयष्टी असलेले व्यक्तिमत्व. पण ‘रायगडाला जेंव्हा जाग येते’ या नाटकात साधारणच अंगकाठी असलेले डॉ. काशिनाथ संभाजीची भूमिका वठवायचे. केवळ जरब बसवणारे भेदक डोळे, उत्कट अभिनय आणि प्रभावशाली संवादफेक या हुकमी अस्त्रांवर अक्षरश: ते रंगमंच उजळून टाकायचे. त्यांचा संभाजी बघताना अंगावर शहारे यायचे. ‘परत आम्हाला असे एकट्याला सोडून नाही ना हो जाणार’ असं म्हणताना कासावीस झालेला संभाजी अजूनही माझ्या डोळ्यांपुढून जात नाही. मी पाहिलेला मराठी रंगभूमीचा तो पहिला सुपरस्टार होता. त्यांच्या पहिल्या प्रवेशानेच टाळ्यांच्या कडकडाटात नाट्यगृह दणाणून जायचे. रायगडाला जेव्हा जाग येते, इथे ओशाळला मृत्यू, अश्रूंची झाली फुले, गारंबीचा बापू, तुझे आहे तुजपाशी यासारख्या अनेक दर्जेदार नाटकांमधील त्यांच्या भूमिका जबरदस्त गाजल्या. डॉ. काशिनाथ घाणेकर यांच्या नांवावर तिकीटबारीवर हाऊसफुलचे बोर्ड लागत असत.” धीरजजी भरभरून बोलत होते. धरण फुटावं, तसं त्यांच्या मुखांतून धो धो शब्द वाहत होते. 

चहाचा ट्रे घेऊन आकाश किती तरी वेळ तसाच ताटकळत उभा होता. मी धीरजजींच्या सोबत चहा घेतला. मराठी नाटकांच्याविषयी आणि नटांच्याविषयी इतक्या आत्मीयतेने बोलणाऱ्या एका उत्तर भारतीयाला पाहून मी भारावून गेलो. परत भेटायला नक्की येईन असं आश्वासन देऊन बाहेर पडलो तर आकाशने माझे दोन्ही हात आपल्या हातात घेऊन घट्ट दाबले आणि एवढंच म्हणाला, “थॅन्क यू सो मच सर.” 

मी म्हटलं, “अरे, खरे तर मीच तुझे आभार मानायला हवेत एवढ्या मोठ्या साहित्यिकाची माझी भेट घडवून आणलीस.”      

दुपारी लंचनंतर आकाश माझ्या केबिनमध्ये शिरला. मी आकाशला म्हटलं, “आकाश, धीरजजी मराठी रंगभूमीविषयी किती भरभरून बोलत होते. गैरसमज करून घेऊ नकोस, पण धीरजजींना मुलं नाहीयेत काय, ते तुमच्याकडे राहतात म्हणून विचारलं. त्यांची प्रकृती देखील खंगल्यासारखी दिसत होती.” 

आकाशनं सांगायला सुरूवात केली, “धीरजजी माझ्या वडिलांचे सख्खे वडील बंधू आहेत. मुंबईत असताना ते एका प्रसिद्ध महाविद्यालयात प्राध्यापक होते. मुंबईच्या वास्तव्यातच त्यांनी महाराष्ट्रीयन मुलीशी लग्न केलं. दोन वर्षापूर्वी ते रिटायर होऊन दिल्लीला परतले. इथे त्यांनी दुमजली घर बांधून ठेवलेलं होतं. दोन्ही मुलांच्या लग्नाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. मुलगा मल्टीनॅशनल कंपनीत चांगल्या पोस्टवर आहे. मुलगी अमेरिकेत सेटल झाली आहे. 

अचानक एका छोट्याशा आजाराचं निमित्त झालं आणि एक आठवड्याच्या आत माझी बडी मम्मी (काकू) वारली. पत्नीच्या मृत्युनंतर ताऊजींचं जीवन एकदम कोलमडून गेल्यासारखे झाले. तिच्याशिवाय त्यांचं पानही हलायचं नाही. त्यांचं मन कुठंच रमत नव्हतं. त्यांचं लिहिणंही खुंटलं म्हणून अधूनमधून येऊन जाणाऱ्या मित्रांचंही येणं बंद झालं. त्यांच्या शिस्तबध्द जीवनाचं वेळापत्रकच कोसळलं. सकाळी फिरायला म्हणून बाहेर पडायचे आणि सकाळचा चहा बाहेरच घेऊन यायचे.

– क्रमशः भाग पहिला 

© श्री व्यंकटेश देवनपल्ली

बेंगळुरू

मो ९५३५०२२११२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “मज नकोत अश्रू, घाम हवा……” ☆ श्री कौस्तुभ केळकर नगरवाला ☆

?जीवनरंग ?

☆ “मज नकोत अश्रू, घाम हवा…” ☆ श्री कौस्तुभ केळकर नगरवाला

हो.. हो.. सगळे सरसोस्तीच म्हणायचे तिला. अगदी एकेरी. पोराटोरांपासून म्हाताऱ्यांपर्यंत. तिच्या नावावर जाऊ नका. वस्तीत तिचा जबरदस्त दरारा होता. बाई कर्तृत्ववान खरी.

लिहण्या वाचण्यापुरतं शिकलेली. तरीही नाव सार्थ करणारी. हजारोंचा हिशोब हाताच्या बोटांवर करायची. काॅम्प्युटरसे भी तेज दिमागवाली, या जगात फक्त दोनच माणसं. एक चाचा चौधरी आणि दुसरी सरसोस्ती. दिमाग आणि जुबान दोन्हीही तेज.

दारूडा नवरा आणि पदरात दोन पोरं. दारू पिवून रोज मारायचा तिला. एक दिवस सहनशक्ती संपली तिची. बांबूच्या फोकानं तुडवला तिनं त्याला. त्या संसाराला लाथ मारली अन् ईथं आली. नाल्याकाठी एकटा बंद जकातनाका. नाक्यापाशी झोपडी बांधून राहू लागली. ऊशाशी कोयता घेऊन झोपायची. काय बिशाद होती कुणाची…?

नाक्यापलीकडं नवीन बिल्डींगा ऊभ्या रहात होत्या. बाई हुशार खरी. भल्या पहाटे मार्केटला जायची. वेचून निवडून भाजी आणायची. सोसायटीवाल्यांना सोईचं झालं. हातगाडीवर लादून दिवसभर भाजी विकली.

मोठं पोर हातगाडीवर दमून तसंच झोपून जायचं. धाकटी पोर खाली झोळीत. प्रत्येक दिवस अंत बघायचा. रडवायचा. बाईनं हिंमत हारली नाही. चार पैसे गाठीशी आले. झोपडीपाशीच भाजीचं दुकान टाकलं. जरा वणवण कमी झाली.

बाई बारा बारा तास दुकानात राबायची. कुणासाठी ? पोरांसाठी. तिला खूप वाटायचं. पोरांनी चांगलं शिकावं. काटकसरीत रहायची. सगळी मौज मारून शाळेची फी भरायची.

पोरगी अभ्यासाला बरी. बारावी झाली अन् तिचं लग्न करून दिलं. पोराचा तेवढा वकूबच नव्हता. शाळेचा निकाल लागला की पोराचाही निक्काल लागायचा. गुरासारखी मारायची पोराला ती. अन् धाय मोकलून रडायची. शेवटी तिनं नाद सोडून दिला. तोही दुकानी राबू लागला. 

ते काहीही असो तिचा पोरगा तिच्यासारखाच. तिच्याच हाताखाली तयार झालेला. धंद्याला पक्का आणि व्यवहाराला चोख. बाईनं त्याला किराण्याचं दुकान थाटून दिलं. तेही जोरात चालायला लागलं. कष्टाला कुणीच कमी नव्हतं. पोराचं लग्न लावून दिलं. सूनबाईही कामाची. घरचं सांभाळून भाजीच्या दुकानात, तिला हातभार लावायची.

खरं तर तिची झोपडी , दुकान सगळंच अनधिकृत. सगळी पडीक, ओसाड, नाल्याशेजारची जागा. तरी ही बाईला शांत झोप लागेना. बाईनं रीतसर ती जागाच विकत घेतली. पक्क घर बांधलं. मागे दहा खोल्यांची बैठी चाळ बांधली. तिथलं भाडं सुरू झालं. टेम्पो घेतला. होलसेलनं भाजी घ्यायला सुरवात केली. मार्केट यार्डला पक्का गाळा घेतला. बाईला कष्टाची नशा चढू लागली. अन् पैशाचीही.

हळूहळू आजूबाजूला वस्ती वाढत गेली. बाईनं चांगली माया जमा केली. नेमकी कशी सुरवात झाली कुणास ठाऊक ?

वस्तीतल्या दिवाकरचा पोरगा.

बारावी झाला. आय.टी.आय. ला टाकायचा होता. फी वाचून अडलेलं सगळं. बाई म्हणाली, मी देते पैसे. शीक, मोठा हो. नोकरीला लाग. अट एकच. पहिल्या सहा महिन्याचा पगार माझा. माती खाल्लीस तर तुझी कातडी सोलून पैसा वसूल करीन. 

पोरगं हुशार, मेहनती. पास झाला. एम.आय. डी.सी.त नोकरीला लागला. बरोब्बर एक तारखेला बाई वसूलीला जायची. सहा महिने असंच चाललं. बाईनं एक पैसा सोडला नाही. काहीही असो, पोरगं लाईनीला लागलं.

हा सिलसिला पुढं चालू राहिला. वस्तीतली पोरं, त्यांचे नातेवाईक..

कित्येक पोरांच्या फीया बाईनं भरल्या. अगदी पोरींच्याही. बाईचा ऊसूल होता. शिकणाऱ्याचा वकूब किती, मेहनत कशी आहे ? शिकून नोकरी मिळेल की नाही ? सगळं बघून पैसा पुरवायची. बाईच्या भितीनं पोरं शिकली.

आय.टी.आय, डिप्लोमा, बी.एड, नर्सिंग. बाईचा एक पैसा कधी वाया गेला नाही. पोरंगं हुशार असलं तर, एम.पी.एस्सी.च्या कोचींगची फी सुद्धा बाई भरायची. अट एकच. पहिल्या सहा महिन्याचा पगार. बाईनं रग्गड पैसा मिळवला यातनं. 

पैसा, सोनं नाणं, जमीन जुमला सगळं स्वतःच्या नावावर. पोराला सांगायची. हे सगळं माझंय. रहायचं तर रहा, नाहीतर वेगळा हो. बाईला फारसं प्रेमानं बोलता यायचंच नाही. कुणावर ही फारसा विश्वास बसायचा नाही. तोंडात सहज शिव्या यायच्या.

चालायचंच.

सहज कानावर आलं. नाल्यापलीकडं बाईनं मोठ्ठी जमीन घेतलीय म्हणे. पैशाकडे पैसा जातो हेच खरं. 

बाई थकली आता. साठीच्या पुढचं वय. एक दिवस पोराला, सुनेला, लेकीला बोलावली. वकील बोलावला. पोराच्या नावावर घर, दुकान. चाळीचं उत्पन्न पोरीच्या नावे करून दिलं. “तुमच्या लायकीप्रमाणं दिलंय तुम्हाला. बाकी तुम्ही आणि तुमचं नशीब.” नवीन घेतलेली जमीन, सोनं नाणं, बँकेतली जमा. आकडा खूप मोठा. बाईनं सगळ्यावरचा हक्क सोडून दिला. चांगल्या माणसांना गळ घातली. ट्रस्ट केला.

दोन वर्षात मोठ्ठी बिल्डींग बांधून तयार. चार वर्ष झालीयेत. ‘सरस्वती विद्या मंदिर’ सुरू होऊन. परवडणारी फी, ऊत्तम शिक्षण. फुकट नको, फी हवीच. त्या शिवाय शिक्षणाची किंमत कळत नाही. बाई असंच म्हणायची. त्याशिवाय हा डोलारा चालणार कसा ?

बाई खरंच ग्रेटय. बाईला यात काहीच विशेष वाटत नाही. सरसोस्ती कळलीच नाही कुणाला. बाई आता थकलीये. तिकडच्या वाटेकडे डोळे लावून बसलीय.

कुणी तरी ट्रस्टीं पैकी म्हणालं. शाळेत बाईचं मोठ्ठं पोट्रेट लावू. चित्रकार बोलावला. बाई वसकन् ओरडली, “माजं न्हाई देवी सोरसोस्तीचं चित्तर लागलं पायजेल शाळंत. माज्या घरावर न्हाई किरपा केली तिनं, समद्या पोरांवर किरपा राहू दे तिची.”

बाईपुढे कुणाचं काय चालणार ?

भरल्या डोळ्यांनी, समाधानानं, बाई लांबच्या प्रवासाला निघून गेलीय. तिचं नाव, तिचा फोटो कुठेच काही नाही. हेच ते सरस्वतीचं चित्र. शाळेच्या पोर्च मधे लावलेलं. खरंय. सोरसोस्ती आम्हाला कधी कळलीच नाही.

© कौस्तुभ केळकर नगरवाला

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “दाखला !” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? जीवनरंग ?

☆ “दाखला !श्री संभाजी बबन गायके 

मध्यरात्रीनंतरचा वाढतच जाणारा काळोख त्यात थंडीच्या दिवसांत पडलेलं धुकं. सतरा एकर माळावरच्या एका कोप-यात असलेली सात-आठ खोल्यांची कौलारू शाळा आणि शाळेपासून पायी सात-आठ मिनिटांच्या अंतरावर असलेल्या शिक्षकांसाठीच्या क्वॉर्टर्स या धुक्यात हरवून गेल्या होत्या. गुरूजी आणि त्यांच्या शिक्षिका पत्नी नुकत्याच या क्वार्टर्समध्ये रहायला आले होते. पाच-सातच खोल्या होत्या इथे पण फक्त एक शिपाईच तिथे मुक्कामाला असे. इतर शिक्षकांनी गावातल्या वस्तीत भाड्याने जागा घेऊन राहणं पसंत केलं होतं. कारण माळारानाजवळ सोबतीला वस्ती नव्हती. विंचु-काट्याची,चोरा-चिलटांची भीती होतीच. हे पती-पत्नी दोघंही एकाच संस्थेत असल्यानं दोघांच्या बदल्याही एकाच वेळी आणि एकाच शाळेत होत असत, ते बरं होतं. नुकतंच लग्न झालेलं, नवीन संसार उभा करायचा होता. गावात भाडं भरून राहण्यापेक्षा क्वॉर्टर मध्ये राहणं परवडण्यासारखं होतं. आणि गुरूजींकडे मुख्याध्यापक म्हणून चार्ज असल्याने त्यांनी शाळेजवळच राहणं सोयीचं होतं. शिवाय शिपायाचं कुटुंब सोबतीला होतंच. शिक्षकाच्या घरात चोरांना मिळून मिळून मिळणार तरी काय म्हणा? घाबरायचं काही कारण नाही अशी एकमेकांची समजूत घालून गुरूजी आणि बाई नव्या जागेत रमण्याचा प्रयत्न करीत होते. एके रात्री दरवाजाच्या फटीतून एक नाग घरात शिरला होता. पण गुरूजींनी त्याला वेळीच पाहिल्यामुळे अनर्थ टळला होता. ती आठवण दोघांनाही अस्वस्थ करीत होतीच. 

दोन वाजत आलेले असावेत. दरवाजावर थाप पडली. नव्या जागेत आधीच लवकर झोप लागता लागत नाही. गुरूजींची झोप तशीही जागसूदच असे. ते चटकन अंथरूणवर उठून बसले. बाईही जाग्या झाल्या आणि दाराकडे पाहू लागल्या. एवढ्या रात्री कोण आलं असावं? एरव्ही फक्त रातकिड्यांचा आवाज ऐकण्याची सवय असलेल्या त्या माळालाही दरवाजावरची ही थाप ऐकू गेली असावी. गुरूजींनी खोलीतला चाळीस वॅटचा बल्ब लावला. दाराबाहेरचा बल्ब गेलेला होता. बाई म्हणाल्या… एकदम दरवाजा उघडू नका…खिडकीच्या फटीतून पहा आधी! आणि त्या गुरूजींच्या मागे येऊन उभ्या राहिल्या. डोक्याला मुंडासं, गुडघ्यापर्यंत धोतर, अंगावर काळी घोंगडी पांघरलेले कुणीतरी दरवाजात उभे होते. सोबत अर्ध्या बाहीचा सदरा आणि आणि पांढरा पायजमा घातलेला पोरसवदा तरूण उभा होता. थंडीमुळे कानावर रुमाल बांधलेला होता त्याने. दोन्ही हात काखेत घालून उभा होता पोरगा. म्हाता-याच्या हातात काठी आणि कंदील होता. दारावरचा आवाज शिपाईही जागा झाला होता, पण त्यानेही लगेच दार उघडायची हिंमत केली नाही. साहजिकच होतं ते. 

गुरूजी खिडकीशी आल्याचं पाहून म्हाता-यानं कंदिल त्याच्या चेह-यावर उजेड पडेल असा धरला आणि म्हणाला, “गुरूजी, माफी असावी. पण कामच तातडीचं आहे. म्हणून तुम्हांला त्रास देतो आहे.” त्याच्यासोबत असलेल्या त्या तरूणाने गुरूजींना पाहून हात जोडून नमस्कार केला. गुरूजींनी दरवाजा उघडला आणि ते बाहेर गेले. 

म्हातारा त्या पोराचा आज्जा होता. पोरगा याच शाळेत मामाच्या घरी राहून सातवी पर्यंत शिकला होता. त्याचा बाप मरून गेला म्हणून त्याची आई माहेरी येऊन राहिली होती. आता आईही वारल्यानं पोरगं पुन्हा आज्ज्याकडं राहायला गेलं होतं. या गावापासून त्याच्या वडिलांचं गाव वीस बावीस कोसावर असावं. पोरगं काही पुढं शिकलं नाही. पण शेतात कामं करून, तालमीत कसून त्याची तब्येत मात्र काटक झाली होती. तालुक्याच्या गावात फौजेची भरती निघाल्याचं त्याला आज सांजच्यालाच समजलं होतं. त्यानं आज्ज्याकडं फौजेतच जाणार म्हणून हट्ट धरला होता. शाळा सोडल्याचा दाखला लागणार होता भरतीत दाखवायला. आणि शाळा सोडली तेंव्हा त्यानं दाखला नेला नव्हता. आणि उद्या शाळा उघडेपर्यंत थांबण्याएवढा वेळ त्यांच्याकडे नव्हता. सकाळी सात वाजता भरती मैदानावर कागडपत्रांसह हजर राहायचं होतं. म्हाता-यानं गुरूजींना हात जोडले, “मास्तर, एवढा एक उपकार करा. पोरगं फौजेत गेलं तर चार घास सुखानं खाईल तरी…रांकेला लागंल.” 

बाई दारात उभे राहून सारं ऐकत होत्या. गुरूजींनी बाईंकडे पाहिलं. खोलीत आले,शर्ट,पॅन्ट चढवली. खिशाला पेन आहे याची खात्री केली,छोटी विजेरी घेतली आणि बाहेर पडले. तोवर शिपाई बाहेर आला होता. गुरूजींनी त्याच्याकडून शाळेची किल्ली मागून घेतली. तू बाईंना सोबत म्हणून इथंच थांब असं त्याला म्हणून गुरूजी त्या दोघांसोबत शाळेकडे निघाले सुद्धा.

त्या अंधारात, त्या माळावर आता ही सहा पावलं पायाखालचं वाळलेलं गवत तुडवत तुडवत निघाली होती. तुम्हाला उगा तकलीप द्यायला नको वाटतंय मास्तर, पण नाईलाज झालाय असं काहीबाही म्हातारा बोलत होता. पोरगा मात्र थोडंसं अंतर ठेवून अपराधी भावनेनं चालत होता, त्यालाही इतक्या रात्री गुरूजींना त्रास द्यावसा वाटत नव्हता. पण शेती धड नाही,रोजगार नाही. वय वाढत चालेलं. काहीतरी केलं पाहिजे पोटापाण्यासाठी , यासाठी फौजेसारखी दुसरी संधी मिळणार नाही, असा त्याचा विचार होता. त्याच्या गावातले जवान सुट्टीवर आलेले तो पहायचा. रूबाबादार युनिफॉर्म,काळी ट्रंक,त्यात घरच्यांसाठी आणलेलं काहीबाही. त्यात नोकरी संपवून गावी आलेले लोकही त्याला माहित होते. फौजेतच जायचं असं त्याने मनोमन ठरवलं होतं. 

गुरूजींनी शाळेचे कार्यालय उघडलं. कपाटातून रजिस्टर बाहेर काढलं. पोराचं प्रवेशाचं आणि शाळा सोडल्याचं वर्ष विचारून घेतलं. पोरानं अंदाजे वर्ष सांगितलं. गुरूजींना अचूक नोंद शोधून काढली. आपल्या वळणदार अक्षरात शाळा सोडल्याचा दाखला लिहून काढला. दाखल्याच्या कागदाखाली कार्बन पेपर ठेवायला ते विसरले नाहीत. त्यांच्या सहीचा त्या शाळेतून दिला जात असलेला तो पहिला दाखला होता. गुरुजींनाही त्यांच्या तरूणपणी फौजेत जायचं होतं पण तो योग नव्हता.

म्हाता-याचे डोळे भरून आले होते. त्याने गुरूजींचे दोन्ही हात आपल्या हातात घेतले आणि त्या हातांवर त्याचं मस्तक ठेवलं…उपकार झालं बघा! पोरगं खाली वाकून पाया पडलं आणि ते तिघेही शाळेच्या बाहेर पडले. म्हाता-याला आणि त्या पोराला शाळेपासून पुढच्या बाजूला असलेल्या रस्त्याने त्यांच्या मार्गाला जाता आलं असतं. पण ते दोघं गुरूजींना सोडवायला पुन्हा क्वॉटरपर्यंत आले. 

भरती झाल्यावर सुट्टीवर आलास की शाळेत येऊन जा. बाकीच्या पोरांनाही स्फुर्ती मिळेल देशसेवेची. बाईंनी त्या पोराला सांगितलं आणि त्याच्या हातावर साखर ठेवली. वीस रुपयाची नोट त्याच्या खिशात ठेवली. आईकडून आलेल्या लाडवांमधून चार लाडू त्याला शिदोरी म्हणून रुमालात बांधून दिले. पोरगं बाईंच्याही पाया पडलं आणि निघालं. पहाटेचे तीन वाजत आले होते. त्याला तालुक्यापर्यंत पायी जायला तीन-साडेतीन तास लागणार होते. सह्याद्रीचा पोरगा हिमालयाच्या रक्षणाला निघाला होता… त्याच्या पाठमो-या आकृतीकडे गुरूजी आणि बाई पहात राहिले ते दृष्टीआड होईपर्यंत. बाहेर झुंजुमुंजु होऊ लागलं होतं….गुरूजी आणि बाई यांच्या मनात समाधानाची पहाट उगवू लागली होती! 

(बोल श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय ही युद्धगर्जना, मानचिन्हात अशोकस्तंभातील तीन सिंह,तुतारी असलेल्या, कर्तव्य,मान,साहस असे ब्रीदवाक्य असलेल्या लढवय्या ‘दी मराठा लाईट इन्फंट्री’चा आज ४ फेब्रुवारी हा स्थापना दिन. यानिमित्ताने एका गुरुजींची ही सत्यकथा सादर केली आहे. देशासाठी लढणा-या सैनिकांना आणि विद्यार्थ्यांसाठी अहोरात्र तत्पर असणा-या शिक्षकांना विनम्र अभिवादन.) 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “धाकटा…” ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

🔆 जीवनरंग 🔆

☆ “धाकटा…” ☆ श्री मंगेश मधुकर 

बा-बापूजींच्या लग्नाचा पंचेचाळीसावा वाढदिवस दिमाखात साजरा झाला.रात्री झोपण्याच्या तयारीत असताना बापूजी म्हणाले “खुश”

“बहोत.”

“एकदम भारी वाटतय.काय पाहिजे ते माग,आज मूड एकदम हरिश्चंद्र स्टाईल आहे“

“सगळं काही मिळालं फक्त एकच..”बांच्या बोलण्याचा रोख समजून बापूजींचा चेहरा उतरला. 

“कशाला तो विषय काढलास.आज नको.”

“उलट आजच्या इतका दुसरा चांगला दिवस नाही.”

“तो एक डाग सोडला तर सगळं काही व्यवस्थित आहे.”

“असं नका बोलू.तुम्ही असं वागता म्हणून मग बाकीचे सुद्धा त्याच्याशी नीट वागत नाहीत.”

“त्याची तीच लायकी आहे.थोरल्या दोघांनी बघ माझं ऐकून पिढीजात धंद्यात लक्ष घातलं,जम बसवला,योग्य वेळी लग्न केलं अन संसारात रमले.सगळं व्यवस्थित झालं आणि हा अजूनही चाचपडतोय.” 

“उगीच बोलायला लावू नका.तुम्ही हॉस्पिटलमध्ये होता तेव्हा थोरल्यांना दुकानाची जास्त काळजी होती.लोक लाजेस्तव दिवसातून दोनदा भेटून जायचे.दिवसरात्र तुमच्यासोबत फक्त धाकटाच होता.बाकीचे पाहुण्यांसारखे. तेव्हाच थोरल्यांचा स्वार्थीपणा लक्षात आला.हॉस्पिटलचं बिल तिघांनी मिळून भरलं पण नंतर त्या दोघांनी तुमच्याकडून पैसे मागून घेतले.धाकट्यानं मात्र विषयसुद्धा काढला नाही.”

“बापासाठी थोडफार केलं तर बिघडलं कुठं?

“थोरल्यांना पैसे देताना हेच का सांगितलं नाही.”

“ते जाऊ दे.झालं ते झालं”

“का?,ते दोघे आवडते आणि धाकटा नावडता म्हणून ..”

“काहीही समज.”

“उद्या गरजेला तर फक्त धाकटाच आधार देईल हे कायम लक्षात असू द्या.” 

“पोरांकडे पैशासाठी हात पसरावे लागणार नाहीत एवढी सोय केलेली आहे”

“प्रत्येक ठिकाणी पैसा कामाला येत नाही.माणसाची गरज पडतेच”

“आज धाकट्याचा फारच पुळका आलाय.”

“पुळका नाही काळजी वाटते.बिचारा एकटाय”

“स्वतःच्या कर्मामुळे.बापाचं ऐकलं नाही की अशीच गत होणार.”

“बिनलग्नाचा राहिला याला तो एकटा नाही तर तुम्ही पण  जबाबदार आहात”

“हे नेहमीचचं बोलतेस”

“तेच खरंय”

“काय करू म्हणजे तुझं समाधान होईल”बापूजी चिडले. 

“तुमच्यातला वाद संपवा.”

“त्यानं माफी मागितली तर मी तयार आहे..”

“पहिल्यापासून सगळ्या पोरांना तुम्ही धाकात ठेवलं. स्वतःच्या मनाप्रमाणं वागायला लावलं पण धाकटा लहानपणापासून वेगळा.बंडखोरपणा स्वभावातच होता.बापजाद्याच्या धंद्यात लक्ष न घालता नवीन मार्ग निवडला आणि यशस्वी झाला हेच तुम्हांला आवडलं नाही.ईगो दुखवला.याचाच फार मोठा राग मनात आहे.”

“तोंडाला येईल ते बोलू नकोस.मी त्याचा दुश्मन नाहीये.भल्यासाठी बोलत होतो.तिघंही मला सारखेच”.

“धाकट्याशी जसं वागता त्यावरून अजिबात वाटत नाही”

“तुला फक्त माझ्याच चुका दिसतात.पाच वर्षात माझ्याशी एक शब्दही बोललेला नाही.”

“बापासारखा त्याचा ईगोसुद्धा मोठाच…कितीही त्रास झाला तरी माघार नाही.”

“एकतरी गोष्ट त्यानं माझ्या मनासारखी केलीय का?”

“तुमचा मान राखण्यासाठी काय केलं हे जगाला माहितेय.”

“उपकार नाही केले.त्यानं निवडलेली मुलगी आपल्या तोलामोलाची नव्हती.ड्रायव्हरची मुलगी सून म्हणून..कसं दिसलं असतं.घराण्याची इज्जत …..” 

“तरुण पोरगा बिनलग्नाचा राहिला तेव्हा गेलीच ना.थोडं नमतं घेतलं असतं तर ..”

“मला अजूनही वाटतं जे झालं ते चांगलं झालं.”

“त्या दोघांचं एकमेकांवर प्रेम होतं.मनात आणलं असतं तर पळून जाऊन लग्न करणं अवघड नव्हतं परंतु केवळ तुमची परवानगी नव्हती म्हणून लग्न केलं नाही.”

“त्यानंतर एकापेक्षा एक चांगल्या मुलींची स्थळ आणली पण..यानं सगळ्यांना नकार दिला.”

“तुम्हा बाप-लेकाचा एकेमकांवर जीव आहे पण पण सारख्या स्वभावामुळे ईगो आडवा येतोय.” 

“काय जीव बिव नाही.मुद्दाम बिनलग्नाचं राहून माझ्यावर सूड उगवतोय.आपल्या लग्नाच्या वाढदिवसालाच तो जन्मला तिथूच पणवती लागली”बापूजींच्या बोलण्यावर बा प्रचंड संतापल्या.तोंडाला येईल ते बोलायला लागल्या. बापूजीसुद्धा गप्प नव्हते.दोघांत कडाक्याचं भांडणं झालं.ब्लड प्रेशर वाढल्यानं बा कोसळल्या. आय सी यू त भरती करावं लागलं.बापूजी एकदम गप्प झाले पण डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं.एक क्षण बांच्या समोरून हलले नाहीत.

—-

“बा,तुझं बरोबर होतं.शेवटी धाकट्यानंच आधार दिला.मी त्याला माफ केलं.माघार घेतो पण तू रुसू नकोस.लगेच धाकट्याला बोलवं.त्याच्याशी मी  बोलतो.आता आमच्यात काही वाद नाही.सगळं तुझ्या मनासारखं होईल.धीर सोडू नकोस.धाकटा कुठायं.त्याला म्हणावं लवकर ये.बा वाट बघातीये.तिला त्रास होतोय.माफी मागतो पण ये.मी हरलो तू जिंकलास.”खिडकीतून पाहत हातवारे करत बोलणाऱ्या बापूजींना पाहून रूममध्ये आलेल्या नर्सनं विचारलं  

“काय झालं.बाबा कोणाशी बोलताहेत ”.

“माझ्या आईशी”

“त्या कुठंयेत ”

“आठ दिवसांपूर्वीच ती गेली.तो धक्का सहन न झाल्यानं बापूजी बिथरले.आपल्यामुळेच हे घडलं या ठाम समजुतीनं प्रचंड अस्वस्थ आहेत.काळचं भान सुटलंय.सतत आईशी बोलत असतात. हातवारे,येरझारा आणि असंबद्ध बोलणं चालूयं.मध्येच चिडतात,एकदम रडायला लागतात म्हणून इथं आणलं.आता सकाळपासून सारखं धाकट्या मुलाला भेटण्यासाठी जीव कासावीस झालाय.त्याला बोलाव म्हणून हजारवेळा मला सांगून झालंय”

“मग त्यांना बोलवा ना.”नर्स 

“मीच तो धाकटा.”

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ बाळा होऊ कशी उतराई ? — भाग – २ ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆

सुश्री प्रणिता प्रशांत खंडकर

? जीवनरंग ❤️

☆ बाळा होऊ कशी उतराई ? — भाग – २ ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆ 

(पण म्हणावी तशी त्याची प्रगती होत नव्हती हातापायांची सहज हालचाल, कुशीवर वळणं, बसणं, कोणी बोललं तर हुंकार, प्रतिसाद देणं हे घडत नव्हतं.) — इथून पुढे —

त्याला पेज, खिमट असं भरवताना बऱ्याचदा ते बाहेर सांडतं, म्हणजे त्याला ते नीटपणे गिळता येत नाही, त्याची लाळ इतरही वेळा गळत असते, असंही करूणानं केलेल्या नोंदीत लिहिलं होतं. 

ही सगळी लक्षणं गंभीर होती. डाॅक्टरांनी त्यासाठी वेगवेगळ्या तपासण्या करायला सांगितल्या. MRI आणि इतर मनोवैज्ञानिक चाचण्यांनंतर cerebral palsy with multiple disorders म्हणजेच मेंदूचा पक्षाघात आणि बहुविकलांगता असं निदान झालं.

सुयशचा IQ – भावनिक बुद्ध्यांक ३० पेक्षा कमी होता. त्यामुळे शारीरिक आणि बौद्धिक क्षमतांचा विकास होऊ शकत नव्हता. तो कायम परावलंबीच राहणार होता. आपल्या नैसर्गिक विधींवरही त्याचं नियंत्रण राहणं कठीण होतं. 

सुवर्णा आणि सुशीलवर हा फार मोठा आघात होता. सुवर्णाला तर नैराश्याचा झटका आला. त्यासाठी तिला मानसोपचार आणि औषधांची मदत घ्यावी लागली. पुढचे सहा महिने ती रजेवरच होती. हळूहळू ती या धक्क्यातून बाहेर आली. नंतर तिच्यावर ओढवलेल्या एकंदर परिस्थितीचा सहानुभूतीने विचार करून, तिला बँकेच्या घाटकोपर येथील शाखेत बदली देण्यात आली.  

सुशीलने ही परिस्थिती खूपच संयमाने हाताळली. या सगळ्या घडामोडींच्या काळात करूणाने सुयशची खूप व्यवस्थित काळजी घेतली. ती त्याचं सर्व काही अगदी निगुतीने करत राहिली. शिवाय घरकामाची जबाबदारीही सांभाळत होती. 

काळ पुढे सरकत राहिला. यमुनाबाईंच्या खटपटीमुळे करूणाचं परत लग्न ठरलं. तिचा होणारा नवरा आणि सासू सायनला राहात होते. आतापर्यंत करूणाचा मुक्काम सुवर्णाच्या घरी होता. पण लग्नानंतर तिला इथे राहणं शक्य नव्हतं. सकाळी लवकर येऊन, संध्याकाळी सातनंतर घरी जायची तयारी तिनं दर्शवली. गरज पडली तर एखाद्या दिवशी उशिरापर्यंत ती थांबणार होती. सायन तसं फार लांब नव्हतं.तिचा नवरा टॅक्सी ड्रायव्हर होता, त्यामुळे येण्या-जाण्याची सोय होती. तिच्या सासरच्यांनीही हे मान्य केलं. करूणाला जेवण-खाण्याशिवाय महिन्याला दहा हजार मिळत होते, हेही त्यांच्या होकाराचं एक कारण होतंच.

सुयशला आणि सुशील- सुवर्णालाही करूणावर अवलंबून राहायची सवय झाली होती. सुयश आता या तिघांचा स्पर्श ओळखत होता. आपली रोजची अंघोळ वगैरे नित्यकर्म या तिघांकडूनच  शांतपणे करून घ्यायला लागला होता. इतर कोणाला मात्र तो जवळपास फिरकू देत नसे. कोणी तसा प्रयत्न केलाच तर आरडाओरडा करून घर डोक्यावर घ्यायचा तो. त्याच्यासाठी चारीकडून उंच कडा असलेला खास बेड बनवून घेतला होता. त्यावरच खेळत काहीतरी करत बसायचा तो. 

करूणाचा सुयशवर जीव होता. तिचंच बाळ होता जणू. त्याच्या कलानं घेत ती त्याचं सगळं करायची. त्याला स्वच्छ ठेवणं, जेऊ घालणं, व्हीलचेअरवर घालून फिरवणं, त्याच्याशी सतत बोलत राहणं सारंच ती ममतेनं करत होती. त्याच्या हावभावांवरून, अस्पष्ट ओरडण्यावरून त्याला काय हवंय, काय होतंय, हे तिला बरोब्बर कळायचं. एक अबोल सांकेतिक भाषा तयार झाली होती त्यांच्यात. 

बारा वर्षे उलटली. त्या दरम्यान करूणाला दोन मुलंही झाली. एक मुलगा आणि मुलगी, तिची सासू दिवसभर नातवंडांची देखभाल करत होती. मुलं शाळेत शिकत होती. नवरा निर्व्यसनी होता, त्यामुळे करूणाचा संसार सुखाचा होता. 

एक दिवस अचानक सुयशला फीट आली. अंगही तापलं होतं त्याचं! करूणानं फोन करून सुवर्णाला सांगितलं आणि टॅक्सी घेऊन नवऱ्याला बोलावलं. मग तिघेजण सुयशला घेऊन घाटकोपरच्या हाॅस्पिटलमध्ये गेली. तिथे ़सुयशचा उपचार होण्यासारखा नाही, त्याला परेलला लहान मुलांच्या हाॅस्पिटलमध्ये न्यायला तिथल्या डाॅक्टरांनी सांगितलं. त्याप्रमाणे हे तिकडे गेले आणि सुशीलला फोन करून  तिकडेच यायला सांगितलं. परेलला सुयशला अ‍ॅडमिट करून घेतलं.तो कोमात गेला होता. पंधरवडाभर त्याच्यावर उपचार चालू होते. पण उपयोग झाला नाही. सुयश वाचला नाही. 

कामतांच्या घरावर दुःखाचा डोंगर कोसळला. कसंही असलं तरी आपलं मूल आई-बापांना प्यारंच असतं. करूणालाही आपलं मूल गमावल्यागत दुःख झालं. त्याच्या जन्मापासून त्याला  सांभाळलं होतं तिनं! नियतीपुढे माणसाचं काही चालत नाही हेच खरं! 

त्याच आठवड्यात सुशीलचं प्रमोशन झालं. त्याला दोन वर्षे फ्रान्सला राहावं लागणार होतं. सुयशच्या जाण्यानं सुवर्णा आणि सुशील सैरभैर झाले होते. त्यामुळे त्यानं हे पोस्टिंग स्वीकारून सुवर्णासह फ्रान्सला जावं, असं सगळ्या आप्तेष्टांना वाटत होतं. नव्या ठिकाणी दुःखाचा थोडा विसर पडेल हा विचार होता. दोन महिन्यांनंतर फ्रान्सला जाॅईन व्हायचं होतं. सुवर्णाची नोकरी तेवीस वर्षे झाली होती. तिला पेंशन मिळणार होती. तिने स्वेच्छा निवृत्ती घेऊन सुशीलसोबत जायचं ठरवलं. तोपर्यंत करूणा त्यांच्याकडे कामाला येणार होती. घाटकोपरच्या फ्लॅटचा विक्रीचा व्यवहार त्यांनी पूर्ण केला होता. 

सर्व सोपस्कार पूर्ण झाले, चार दिवसांनी ती दोघं फ्रान्सला प्रयाण करणार होती. त्याआधी सुवर्णा आणि सुशीलने करूणाचा पगार चुकता केला. तिच्या मदतीचं मोल पैशात होणार नव्हतंच. फूल ना फुलाची पाकळी म्हणून, त्यांनी तिच्यासाठी एकरकमी पाच लाख रुपये गुंतवून आयुर्विम्याची पेंशन पाॅलिसी घेतली. त्यायोगे तिला आयुष्यभर दरमहा २१००रूपये मिळणार होते आणि तिच्या मृत्यूनंतर तिच्या वारसाला पाच लाख रूपये एकरकमी मिळणार होते. ती पाॅलिसी त्यांनी करूणाच्या हवाली केली. 

निरोप घेताना करूणाला आणि त्या दोघांनाही अश्रू आवरत नव्हते. सुयश सोबत काढलेले फोटो करूणानं सुवर्णाकडे मागून घेतले होते. तिचा पाय या घरातून निघत नव्हता, पण आता जायला हवे होते. एवढ्यात सुशीलचा फोन वाजला. बोलता बोलता त्याने हाताने खूण करून करूणाला थांबायची खूण केली. 

फोन परेलच्या लहान मुलांच्या हाॅस्पिटलमधून होता. त्या हाॅस्पिटलमध्ये दिव्यांग आणि मतिमंद मुलांसाठी एक विशेष विभाग उघडण्यात येणार होता. त्यांना अशा मुलांना सांभाळण्याचा अनुभव असलेली मदतनीस हवी होती. सुयश तिथे अ‍ॅडमिट असताना तिथल्या डाॅक्टरांनी करूणाला बघितलं होतं, ती किती आस्थेवाईकपणे आणि निगुतीनं त्याचं सगळं करत होती. 

परेलचं हाॅस्पिटल खूप मोठं आणि नामांकित होतं. करूणाला चांगला पगार आणि इतर सवलती व लाभही मिळणार होते. तिची तयारी असेल तर येत्या एक तारखेपासून तिची नियुक्ती तिथे केली जाणार होती. आर्थिक दृष्ट्या तिची चांगली सोय होईल याचं सुवर्णा आणि सुशीलला समाधान वाटत होतं. सुयशचा फोटो छातीशी धरून ओक्साबोक्शी रडणार्‍या करूणाला मात्र आजवर सगळं आपल्याला सुयशमुळेच मिळालं आणि तो गेल्यावरही हे मिळतंय याची जाणीव तीव्रतेने होत होती. सुयश बाळाच्या या ऋणातून ती कशी मुक्त होणार होती? 

— समाप्त — 

© सुश्री प्रणिता खंडकर

संपर्क – सध्या वास्तव्य… डोंबिवली, जि. ठाणे.

ईमेल [email protected] केवळ वाॅटसप संपर्क.. 98334 79845.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ बाळा होऊ कशी उतराई ? — भाग – १ ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆

सुश्री प्रणिता प्रशांत खंडकर

? जीवनरंग ❤️

☆ बाळा होऊ कशी उतराई ? — भाग – १ ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆ 

सुवर्णा आणि सुशील कामत एक उच्च विद्या विभूषित आनंदी जोडपं. सुवर्णा बँकेत अधिकारी पदावर आणि सुशील एका मल्टिनॅशनल कंपनीत उच्च पदस्थ अधिकारी. तीनच वर्षांपूर्वी लग्न होऊन मुंबईच्या उपनगरात त्यांनी संसार थाटला होता. आणि आता त्यांच्या घरात लवकरच नवीन पाहुण्याचं आगमन होणार होतं.

सुवर्णाची आई मुंबईतच होती. मागच्या वर्षी सुवर्णाच्या वडिलांचं निधन झाल्यापासून ती एकटीच राहात होती. सुवर्णा आणि साधना या दोन्ही लेकींकडे अधून-मधून यायची राहायला. सुशीलचे आई-वडील गोव्यात स्थायिक होते. धाकटी बहीण लग्न होऊन बेंगलोरला आणि मोठा भाऊ सुहास अमेरिकेत होता.

सुवर्णाचं बाळंतपण करायला तिची आई आणि सासूबाई घाटकोपरच्या तिच्या घरी येऊन राहणार होत्या. पण त्या काही कायम तिथे राहणार नव्हत्या. ऑफिसमधून घरी यायला दोघांना उशीर व्हायचा. त्यामुळे बाळाला सांभाळायला आणि घरकामात सुवर्णाला मदत करायला कोणी मिळेल का याचा ते शोध घेत होते. त्यांच्याकडे झाडू-पोछा आणि भांडी घासायला येणाऱ्या यमुनाबाईंनापण सुवर्णानं तसं सांगून ठेवलं होतं.

रविवारी सकाळी कामाला आल्यावर यमुनाबाईं सुवर्णाला म्हणाल्या, “ताई, गावाकडं माझ्या बहिणीची लेक आहे बघा करूणा. १९-२० वर्षाची हाय. गुणाची हाय पोरगी, कामात बी हुशार हाय. मागल्या वर्षी लगीन झालं, पण नवरा दारूपिऊन लय मारहाण करायचा, म्हणून तीन महिन्यांत घरला परत आली बघा. आता माझी बहिण आणि मेवणं तर जिंदा न्हाई. भाऊ-भावजयीच्या संसारात या पोरीची अडगळच होते भावजयीला. तर ती यायला तयार हाय, तुमच्याकडं बाळाला सांभाळायला.

तुमाला चालणार असंल तर मी बोलावून घेते तिला. दोघांचीबी नड भागंल.”

सुवर्णाला तर कोणीतरी हवंच होतं मदतीला. तिला आता सातवा महिना लागला होता. सासूबाई पुढच्या महिन्यात येणार होत्या. तसं काही गरज लागली तर आई तासाभराच्या अंतरावर चेंबूरला होतीच. 

पुढच्याच आठवड्यात करूणा आली गावाहून. सावळ्या रंगाची करूणा चटपटीत आणि स्वच्छ होती. बारावीपर्यंत शिकलेली होती. सुवर्णाची जागा मोठी होती. दोन वन बीएचके  फ्लॅट जोडून घेतलेले होते, त्यामुळे एकूण सहा खोल्या होत्या आणि दोन स्वतंत्र टाॅयलेट! शिवाय दोन गॅलऱ्या होत्या. एका खोलीत करूणाची  व्यवस्था करता येणार होती. बाळ तीन महिन्याचं होईपर्यंत करूणानं सुवर्णाकडेच मुक्काम करायचा असं ठरलं होतं. मधल्या काळात यमुनाबाई तिच्यासाठी रहायला भाड्याने एखादी खोली मिळते का ते बघणार होत्या. 

आल्या दिवसापासून करूणानं कामाचा झपाटाच लावला. किचनची साफसफाई, पडदे-चादरींची धुलाई, घर आणखीनच चकाचक झालं. सुवर्णाला काय हवं-नको ते विचारून ती नाश्ता, जेवण बनवायला शिकली. नाव ठेवण्यासारखं काहीच नव्हतं. 

थोड्याच दिवसात सुवर्णाच्या सासूबाई आल्या. मग त्यांच्या देखरेखीखाली करूणाने डिंकलाडू, आलेपाक, सुपारी असे खास बाळंतिणीसाठीचे पदार्थही बनवले. सुवर्णाच्या आईला शिवणकाम येत होतं. पण आता मशीनवर काम करणं त्यांना जमत नव्हतं. करूणानं त्यांच्याकडे  शिवणकाम शिकायला सुरुवात केली. त्यांची मशीन सुवर्णाकडेच आणली. मग दोघींनी मिळून बाळासाठी दुपटी, झबली-टोपरी असे कपडे शिवून तयार ठेवले. नवीन काही शिकण्याचा करूणाचा उत्साह नावाजण्यासारखा होता. आणि ते पटकन शिकण्याइतकी ती हुशारही होती.

नऊ महिने आणि चार दिवस झाले आणि सुवर्णाला दवाखान्यात अ‍ॅडमिट करायची वेळ आली. पण कळा सुरू होऊन नंतर पूर्णच थांबल्या. इंजेक्शन देऊनही उपयोग झाला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी बाळाच्या ह्रदयाचे ठोके अनियमित झाले होते. सोनोग्राफीमध्ये, नाळ बाळाच्या गळ्याभोवती गुंडाळली गेल्याचं दिसलं आणि मग सुवर्णाचं सिझेरियन करावं लागलं. 

बाळाचं वजन साडेपाच पाउंड/अडीच किलो होतं. जन्मल्यावर थोडावेळ ते रडलंच नाही म्हणून जरा टेंशन होतं. पण नंतर हळू आवाजात का होईना ते रडलं आणि सगळ्यांना हुश्श झालं. मुलगा झाला होता. सगळे आनंदात होते. सुशीलही पंधरा दिवस रजा घेऊन घरी होता. 

दहा दिवसांनी बाळ-बाळंतीण घरी आले. दोन्ही आज्या आणि करूणा त्यांच्या सरबराईत गुंतल्या. सव्वा महिन्यानंतर बारसं झालं आणि बाळाचं नाव सुयश ठेवलं. बाळाचं कोडकौतुक करण्यात दोन महिने कसे संपले ते कळलंच नाही. सुशीलचं ऑफिस सुरू होतं. सुवर्णाच्या सासूबाईंना आता गोव्याला परतायला हवं होतं. घर-बागायत सांभाळायला सासरे तिकडे एकटेच होते. बारशाला येऊन लगेच ते परत गेले होते. 

दुसऱ्या महिन्यात सुयशला ट्रिपलचं इंजेक्शन द्यायला हाॅस्पिटलमध्ये नेलं. तेव्हा इंजेक्शन देणाऱ्या नर्सला काही तरी वेगळं जाणवलं. तिनं सुवर्णाला बाळाला लहान मुलांच्या डाॅक्टरांना एकदा दाखवून घ्या, असं सुचवलं. कारण काही सांगितलं नाही. पण सुवर्णानं काही फारसं मनावर घेतलं नाही. आजकाल सगळे कटप्रॅक्टिसचे प्रकार चालतात, तसंच हे असणार अशी तिची समजूत झाली. पण तीन महिने झाले तरी सुयश कोणाकडे बघून असं हसत नव्हता, आवाजाच्या दिशेने त्याची नजर फिरत नव्हती, हे एकदोनदा तिची आई आणि सासूबाईंनी देखील म्हटलं. मग मात्र सुवर्णा आणि सुशील त्याला लहान मुलांच्या डाॅक्टरांकडे दाखवायला घेऊन गेले. करूणाही त्यांच्या सोबत होतीच. 

डाॅक्टरांनी सुयशला तपासलं. त्यांनी दोघांना विशेषतः सुवर्णाला बरेच प्रश्न विचारले. गरोदरपणात ती कधी आजारी पडली होती का? कोणती औषधं घेतली होती यासाठी त्यांनी तिची फाईलही नीट बघितली. पण साध्या सर्दी-खोकल्याखेरीज सुवर्णाला काही झालं नव्हतं आणि त्यासाठी कोणतीही वेगळी औषधं तिनं घेतली नव्हती. 

बाळ जन्मल्यावर लगेच रडलं नव्हतं, त्याला ऑक्सिजन कमी पडल्यामुळे तसं झालं असावं, असं डाॅक्टर म्हणाले. त्याचं वजन तसं व्यवस्थित वाटत होतं. पण तो बराच वेळ झोपून राहतो, भुकेची वेळ टळून गेली तरी न रडता नुसता पडून राहतो, हे त्यांनी सुवर्णाकडे चौकशी केल्यावर, तिलाही जाणवलं. तरी अजून थोडे दिवस जाऊ द्या, काही मुलांची प्रगती उशिरा होते, असंच डाॅक्टर म्हणाले. पण त्याच्या रोजच्या भुकेची, झोपेच्या वेळेची नोंद ठेवायला त्यांनी सांगितलं आणि एक महिन्यानंतर परत दाखवायला घेऊन या म्हणाले. म्हणून दोन्ही आज्यांना कोणी काही सांगितलं नाही. सुवर्णाच्या सासूबाई गोव्याला परत गेल्या. सुवर्णाच्या भाच्याचा हात फ्रॅक्चर झाला, म्हणून आई तिच्या बहिणीकडे गोरेगावला गेली. 

आत्तापर्यंत बाळ फारसं त्रास देत नाही म्हणून आनंद वाटत होता, त्याची जागा आता काळजीनं घेतली. डाॅक्टरांनी सांगितल्याप्रमाणे सर्व नोंदी ठेवण्याचं काम करूणा इतकं व्यवस्थित करत होती, की डाॅक्टरांनीही तिचं कौतुक केलं. पुढचे दोन-तीन महिने सुयशला नियमितपणे डाॅक्टरांकडे नेत होते. पण म्हणावी तशी त्याची प्रगती होत नव्हती हातापायांची सहज हालचाल, कुशीवर वळणं, बसणं, कोणी बोललं तर हुंकार, प्रतिसाद देणं हे घडत नव्हतं. 

– क्रमशः भाग पहिला 

© सुश्री प्रणिता खंडकर

संपर्क – सध्या वास्तव्य… डोंबिवली, जि. ठाणे.

ईमेल [email protected] केवळ वाॅटसप संपर्क.. 98334 79845.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ क्षमा ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

?जीवनरंग ?

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ क्षमा ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

पुण्याच्या आसपासचं गाव. कुटुंब ठिकठाक. एक आजोबा वयोमानामुळे घरीच बसून. आज्जी आधीच गेलेली. साहजिकच सुनेवर सर्व भार. आधी किरकोळ कुरबुर. मग बाचाबाची. त्यानंतर कडाक्याची भांडणं. सुनेचं म्हणणं ‘ घरी बसुन ऐद्यासारखं खाऊ नका. काम करून हातभार लावा संसाराला.’ 

पण बाबा थकलेले. शेवटी सुनेचे टोमणे खाण्यापेक्षा घर सोडायचं त्यांनी ठरवलं. मुलानेही अडवलं नाही. आले पुण्यात. कुणी म्हातारा म्हणुन काम देईना आणि भूक जगू देईना. भीक मागण्यावाचून पर्याय उरला नाही.

बाहेरच मुलाला भेटून, लाज टाकून बाबा विचारायचे, ” येऊ का रे बाळा घरी रहायला? ” 

‘बाळ’ म्हणायचे, ” मला काही त्रास नाही बाबा, पण ‘हि’ला विचारुन सांगतो.” 

पण, ” या बाबा घरी ” असा निरोप बाळाकडून कधी आलाच नाही !

आता बाबा अट्टल भिकारी झाले…. झाले, की त्यांना केलं गेलं? 

अशीच भीक मागताना एके दिवशी माझी न् त्यांची भेट झाली. बोलताना बाबा म्हणायचे, ” डाॕक्टर, म्हातारपण म्हणजे नाजुक वेल हो. वेलीवरच्या सुंदर फुलांकडे सगळ्यांचं लक्ष जातं, पण या फुलांना अंगाखांद्यावर खेळवणाऱ्या वेलीकडे कुणाचंच लक्ष नसतं. वेल बघा नेहमी झुकलेली आणि वाकलेलीच असते. कुणाचाच आधार नसतो म्हणून. तसंच हे म्हातारपण. झुकलेलं आणि वाकलेलं. निष्प्राण वेलीसारखं.! “

बाबांची वाक्य ऐकून काटा यायचा अंगावर माझ्याही !

” नाव, पत्ता, पिनकोड सहित पत्र टाकूनही  पत्र पत्त्यावर पोचत नाहीत डाॕक्टर, त्याला पोस्टाचं तिकिट लावलं तरच ते पत्त्यावर पोचतं. नाहीतर वर्षानुवर्षे पडून राहतं धूळ खात पोस्टातच. तसंच आमचं आयुष्य ! नाव पत्ता सग्गळं बरोबर ! पण देव आमच्यावर तिकिट लावायला विसरला, म्हणून आम्ही इथं पडलेले.” असं बोलून ते हसायला लागतात. त्यांचं ते कळवळणारं हसू आपल्यालाच पीळ पाडून जातं.

मी म्हणायचो, ” बाबा हसताय तुम्ही. पण हे हसू खोटं आहे तुमचं.”

तर म्हणायचे. “आयुष्यभर सुखी असल्याचं ढोंग केलं. हसण्याचं नाटकच केलं. आता या वयात तरी खरं हसू कुठुन उसनं आणू ? ” ….  मी निरुत्तर ! 

” वाळलेल्या सुकलेल्या पालापाचोळ्यासारखं आयुष्य झालंय. कुणीतरी येतं आणि आम्हाला गोळा करतं. टोपलीत ठेवतं. वाटतं चला, कुणाला तरी आपली दया आली. नंतर कळतं की सुकलेले आहोत म्हणून जाळण्यासाठी, शेकोटी पेटवण्यासाठी आपल्याला टोपलीत ठेवलंय. सुकलेल्या पालापाचोळ्याचा नाहीतरी दुसरा वापर काय होणार म्हणा ?” …  बाबांचं बोलणं ऐकून, मीच आतून तुटून जायचो.

“काहीतरी काम करा बाबा,” असं सांगून मी त्यांना विनवायचो, पण आता उमेद गेली होती. बाबा कामाला तयार नव्हते.! म्हणायचे, “आज आहे मातीवर, उद्या मातीखाली जायचं. किती दिवस राहिलेत आता ? आज कुणी विचारत नाही, पण उद्या मेल्यावर हेच लोक अंत्यदर्शनाला येवून पाया पडतील. श्राद्धाला जेवताना 

‘ चांगला होता हो बिचारा ‘ असं म्हणतील. नाटक असतं हो सगळं आयुष्यच. प्रत्येकजण आपापली भूमिका पार पाडत असतं इतकंच !”

इतकं असुनही, एके दिवशी मी बाबांना कामाला तयार केलंच. बॕटऱ्या विकण्यासाठी त्यांना मदत केली. शे पाचशे रुपये रोज कमावतात बाबा आता. भीक मागत नाहीत. 

… मागच्या महिन्यात मला मिळालेला पुरस्कार याच बाबांना मी समर्पित करुन स्टेजवर यांचा सत्कारही करायला लावला होता ! 

आज हे आठवायचं कारण म्हणजे, आज मला हे बॕटऱ्या विकताना रस्त्यावर भेटले. मला जरा बाजुला घेऊन गेले. म्हणाले, ” एक गंमत सांगायचीय डाॕक्टर ! सुनेला कळलंय माझ्या, मी दहा पंधरा हजार कमावतो. तर मला शोधत माझा मुलगा आला होता पुण्यात आणि म्हणाला, “हिने” तुम्हाला घरी बोलवलंय, झालं गेलं जाऊ दे म्हणते. पाया पडून माफी मागायला तयार आहे. बाबा, मला पण तुमच्या धंद्यात घ्या, एकत्र मिळून करु.”

मी स्तिमित झालो, तीन वर्षं आपल्या बापाला/सासऱ्याला भीक मागायला लावली. आता पैसा दिसायला लागल्यावर सगळी नाती जवळ यायला लागली.? 

” डाॕक्टर काय करु ? सल्ला द्या.”

साहजिकच मी बोललो, ” ज्यांनी तुमच्यावर ही वेळ आणली, त्यांना थारा देण्याचा प्रश्नच नाही, त्यांना तुम्ही नाही, पैसा हवाय तुमचा, आता त्यांना जवळ नका करु ! “

बाबा म्हणाले, ” डाॕक्टर मला कळतंय हे सगळं, पण एक सांगू? आज मी माझ्या पोराला हात दिला नाही तर उद्या माझ्या जागेवर माझा पोरगा दिसंल भीक मागताना ! चालेल तुम्हाला ? मी माझ्या माघारी, त्याला 

भिकारी बनवून जाईन का? अहो, चुकतात तीच पोरं असतात. माफ करतो तोच ‘बाप’ असतो पण आता आयुष्याच्या शेवटच्या  वळणावर तरी, ‘ क्षमा ‘ म्हणजे काय हे मला त्याला शिकवू द्या डाॕक्टर…

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ सुलु आणि नंदू … – भाग-२ ☆ श्री प्रदीप केळूसकर ☆

श्री प्रदीप केळुस्कर

?जीवनरंग ?

☆ सुलु आणि नंदू … – भाग-१ ☆ श्री प्रदीप केळूसकर

(एवढ्यात नंदूची आई किचन मधून बाहेर आली.) –इथून पुढे –

आई -चलात का चलात… मला चालणार नाही, ती कुठल्या जातीची मुलगी आमच्या घरात राहू शकत नाही.

आजोबा – आम्ही कधी जातीचा विचार केला नाही, ज्याला गरज आहे त्याच्या शिक्षणासाठी मदत करणे हा आमचा खरा धर्म. वरच्या जातीचा खालच्या जातीचा उल्लेख करणे आमच्या घराण्याला शोभत नाही.

आई – पण माझ्यावर माझ्या माहेरी तसे संस्कार झाले त्याचे काय?

आजोबा चिडून म्हणाले ” अशा संस्कारामुळे समाजाचे आणि देशाचे नुकसान होते आहे ‘

असे मोठ्याने बोलून आजोबा घराबाहेर पडले.

नंदूच्या बाबाच्या बँकेत शिपाई होता, त्याची बायको त्याचा डबा घेऊन बँकेत द्यायची.  नंदूच्या बाबानी तिला बोलावून घेतले आणि सुलुची राहायची व्यवस्था तिच्याकडे केली. त्यामुळे सुरू चा रोज जाण्या-येण्याचा त्रास वाचला आणि ती शहरातच राहू लागली.

नंदू अकरावीच्या क्लासला जात होती, क्लासच्या शिक्षकांचे नोट्स  सुलु ला दाखवत होती, अकरावी बारावीत सुद्धा सुलु वर्गात पहिली आली. त्या काळात बारावीनंतर मेडिकलला प्रवेश मिळत होते.

  नंदूचे आजोबा पुन्हा तिच्या मागे राहिले, आपल्या सुनेच्या रोशाकडे दुर्लक्ष करून सुलु ला मेडिकल ला पाठवायचा चन्ग त्यांनी बांधला, पैशाची गरज होती.

एक दिवस सकाळीच ते त्यांच्या विभागात निवडून आलेल्या जिल्हा परिषद सदस्याच्या घरी गेले, एवढी प्रतिष्ठित व्यक्ती आपल्या घरी आले म्हणून तो सदस्य गडबडला.

नंदूचे आजोबा – मी तुमच्यकडे एका मुलीच्या शिक्षणा साठी मदत मागूक इलंय, माझ्या नातीसाठी न्हय, आमच्या गावाततली सुभाष मेस्त्रीच्या मुलीक मेडिकल कडे ऍडमिशन मिळतली, लहानपणा पासून हुशार मुलगी, आता पर्यत चो खर्च कसो तरी केलो पण हो मोठो खर्च आसा, चार वर्षाची फी आणि हॉस्टेल आणि इतर खर्च, एक गरीब कुटुंबातील मुलगी डॉक्टर झाली तर समाजाचो फायदो आसा, तुमी त्या मुलींसाठी काय मदत करशात?

तो जिल्हा परिषद सदस्य आश्चर्यचकित झाला, आतापर्यंत येणारे,आपल्या मुलासाठी किंवा नातू नातवा साठी मदत मागायचे, पण हा माणूस एका गरीब मुलींसाठी सकाळी सकाळी घरी येतो?

त्यांनी आजोबांना आमदारांना सांगून तिचा सर्व खर्च उचलण्याचा शब्द दिला, आमदार पण मुद्दाम येऊन भेटले, सुलु चें कौतुक केले आणि नंदुच्या आजोबांना नमस्कार करून गेले.

सुलुची ऍडमिशन पक्की झाली आणि अख्ख्या गावात आनंद झाला.आमदारांनी आपला शब्द पाळला, दर वर्षी नियमित पैसे पाठविले. सुलु MBBS झाली, मग एक वर्ष एंटर्नल कोल्हापूर मध्ये करून पोस्ट graduation चा अभ्यास करू लागली.

बारावी काठावर पास झालेल्या नंदूने बीएससी ला ऍडमिशन घेतले, पण पहिल्याच वर्षाला ती दोनदा नापास झाली, आणि शेवटी तिचे शिक्षण थांबले, आपल्या मुलीसाठी नंदूच्या आईने खूप प्रयत्न केले पण नंदूला अभ्यासात गती नव्हती हे खरे, नंदू ने  डीएड ला ऍडमिशन घेतली, डीएड होऊन एक वर्ष घरी बसल्यावर ती प्राथमिक शिक्षिकेच्या नोकरीला लागली. आणखी एक वर्षांनी तिचे एका हायस्कूल शिक्षकाबरोबर लग्न झाले.

त्या दरम्यानच नंदूच्या आजोबांचे निधन झाले. नंदूची आजी गावी एकटी राहू लागली.

दीड वर्षानंतर नंदूची प्रसूती जवळ आली, शहरातल्या एका डॉक्टरच्या हॉस्पिटलमध्ये तिचे नाव घातले होते. त्या काळात छोट्या शहरात सोनोग्राफी वगैरे यंत्रे आली नव्हती.

प्रसूती वेदना सुरू झाल्याबरोबर नंदूला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले, डॉक्टरनी तपासल्यानंतर त्यांच्या लक्षात आले मुल आडवे आले आहे, सर्जरी करावी लागेल, एकतर डॉक्टर बाहेरून मागवावा लागेल किंवा किंवा जिल्हा रुग्णालयात नवीन लेडी डॉक्टर आली आहे तिच्याकडे तातडीने न्यावे लागेल. नंदूच्या बाबांनी जिल्हा रुग्णालयात नेण्याचा निर्णय घेतला. ॲम्बुलन्स वीस किलोमीटर वरील जिल्हा रुग्णालयात पोहोचली, तेव्हा नवीन लेडी डॉक्टर जवळ भरपूर पेशंट जमले होते. सिरीयस पेशंट आल्यामुळे डॉक्टरने आपली ओपीडी थांबवून पेशंटला ऑपरेशन थिएटर मध्ये घेण्यास सांगितले. त्या छोट्या हॉस्पिटलमध्ये गुंगीचे औषध पण स्वतः डॉक्टरच देणार होत्या. गुंगी देण्याची तयारी करण्यासाठी पेशंटच्या बेड जवळ आल्या, तर डॉक्टरना बेडवर दिसली त्यांची प्रिय मैत्रीण नंदू.

तशाच डॉक्टर सुलभा मिस्त्री बाहेर आल्या, बाहेर काळजीत बसलेल्या नंदूच्या आई आणि बाबांना त्यांनी वाकून नमस्कार केला. प्रत्यक्ष सुलभाला डॉक्टरच्या वेशात समोर पाहून   आश्चर्य वाटले व आनंद झाला. काही काळजी करू नका मी सर्व काही योग्य करते असं सांगून डॉक्टर मिस्त्री आत गेल्या.

तीन तासानंतर प्रसुती उत्तम पार पडून मुलगा झाला. नंदूच्या आई-बाबांना आणि नातेवाईकांना ही बातमी कळली. ते दोघे आणि नंदूचा नवरा डॉक्टर मिस्त्री ला भेटायला आले. डॉक्टरांनी त्यांना प्रसूती अवघड होती पण मी उत्तम केली काही काळजी करू नये असे सांगून निर्धास्त केले.

आणखी दोन तासांनी नंदू शुद्धीवर आली, तिच्या शेजारी तिची प्रिय मैत्रीण सुलु उभी होती, नंदू ने सुरु चा हात घट्ट पकडला.

“सुले, तुझ्यामुळे माझा पुनःर्जनम झाला ग.’.

“तसा काय नसता गो नंदू, तूझ्या माझ्या आजोबानी जन्म घेतलोवा तूझ्या पोटी, तेंचो जन्म होऊक माझो हात लागलो इतकोच ‘.

हातात हात घेऊन सुलु आणि नंदू हसू लागल्या, शाळा सुटल्यावर घरी जाताना हसायच्या तशाच, तीच मैत्री अजून तशीच,.

नंदूची आई भरलेल्या डोळ्यांनी त्यांची मैत्री अनुभवत होती.

– समाप्त –

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ सुलु आणि नंदू … – भाग-१ ☆ श्री प्रदीप केळूसकर ☆

श्री प्रदीप केळुस्कर

?जीवनरंग ?

☆ सुलु आणि नंदू … – भाग-१ ☆ श्री प्रदीप केळूसकर

इयत्ता दुसरीतील सुलु आणि नंदू घरी निघाल्या. दोघींच्या हातात परीक्षेचे रिझल्ट होते, सुलु वर्गात पहिली आली होती  आणि नंदू जेमतेम पास झाली होती. पण सुलु आणि नंदू यांना त्याची जाणीव नव्हती. ओढ्यातील पाण्यात खेळत, एकमेकांवर पाणी उडवत त्या घरी निघाल्या.

ओढा संपल्या संपल्या मेस्त्रीची आळी लागायची, सर्व मेस्त्रीची घर, घराच्या छप्पर दुरुस्तीचे काम करणारे मेस्त्री. सुलु मातीच्या, जुन्या घरात शिरली तेंव्हा आई ओढ्यावर कपडे धुवायला गेली होती, मोठया दोन बहिणी जंगलात लाकडे गोळा करायला गेल्या होत्या, सुलु च्या आईने चुलीवर पेज शिजवून ठेवली होती, त्या मडक्यातील पेज भांड्यात ओतून सुलु पेज जेऊ लागली.

नंदूची आई नंदूची वाटच बघत होती, नंदू गावातील सुस्थितीतील मुलगी, तिचे बाबा बँकेत तालुक्याच्या गावी नोकरीला होते, आजोबा प्रतिष्ठित माणूस, गोरगरिबांच्या उपयोगी पडणारे, गरिबांचा कनवाळा असलेले. नंदूची आई रत्नागिरीतील शहरात राहिलेली, तिचे माहेरचे सगळे शिकलेले.

नंदू ने दुसरीचे मार्कलिस्ट आईच्या हातात दिले, नंदूची आई चिडली, तिने नंदूच्या पाठीत दोन धपाटे घातले. नंदूच्या रडण्याचा आवाज ऐकून तिचे आजी आणि आजोबा धावून आले.

आजोबा – अग का मारतेस तिला?

आई – मार्क बघा तिचे, अशी बशी पास झाली आहे, एवढा मी अभ्यास घेते तरी हिच्या अभ्यासात सुधारणा नाही, माझ्या भावाची बहिणीची मुले किती हुशार, पण हिचे या खेड्यात राहून नुकसान होते आहे.

आजोबा –मग ती मेस्त्रीची सुलु कसे मार्क मिळविते? तिचा वर्गात पहिला नंबर आला आहे.

आई – मला माझ्या मुलीची काळजी आहे, या खेड्यात राहून तिचे नुकसान होणार, नाहीतरी तिच्या बाबांची नोकरी तालुक्याच्या गावीच आहे, तेव्हा यांना सांगणार आपण आता तालुक्याच्या गावी बिऱ्हाड करू, त्याशिवाय नंदूच्या अभ्यासात प्रगती होणार नाही.”

नंदूची आजी काहीतरी सांगायला जात होती, पण आजोबांनी हात दाखवून तिला गप्प केले, नाहीतरी हल्ली नंदूची आई सतत आम्ही तालुक्याच्या गावी बिऱ्हाड करणाऱ्याचे तुंतून वाजवत होती.

संध्याकाळी नंदूचे बाबा आल्यानंतर नंदूच्या आईने नंदूचे मार्क दाखवले, आणि आता शहरात जाण्याशिवाय मार्ग नाही तेव्हा शहरात बिऱ्हाड करायचे आहे असे निक्षुन सांगितले. नंदूच्या आईला काहीतरी समजावत होते, पण आजोबा म्हणाले” मिलिंद, नंदुच्या आईचे जर असे मत असेल की शहरात गेल्यावर तिची प्रगती होईल, तर होऊ दे तिच्या मनासारखे.

अशा रीतीने जून महिन्यात नंदूच्या बाबांनी शहरात बिऱ्हाड केले. नंदू शहरात जाताना सुलू च्या घरी जाऊन सुरूला मिठी मारून खूप रडली. सुलु ने तिची समजूत घातली, नंदू म्हणाली अधून मधून मी घरी येतच असणार तेव्हा आपण भेटू.

शहरात आल्यावर नंदूच्या आईने नंदूचे नाव कलासात घातले तसेच चांगले शाळेमध्ये नाव घातले, पण नंदूची तिसरीतही प्रगती दिसेना, चौथी स्कॉलरशिप साठी नंदूच्या आईने नंदूसाठी खूप प्रयत्न केले, पण चौथी स्कॉलरशिप नंदूला खूप कमी मार्क मिळाले, खेडेगावात राहून सुलु ने स्कॉलरशिप मिळवली.

नंदूच्या आजोबांनी शिक्षणाधिकाऱ्यांना बोलावून सुलु चा सत्कार केला, नंदूच्या आईला आजोबांचा फार राग आला. तिने रागाने नंदूच्या आजोबांनाविचारले

नंदूची आई – तुमच्या नातीला स्कॉलरशिप मध्ये एवढे कमी मार्क असताना, तुम्ही त्या गावातल्या सुलु चा सत्कार का घडवून आणलात? तुम्हाला तुमच्या नातीचें मार्क बघून वाईट नाही का वाटले?

आजोबा – माझ्या नातीला जर चांगले मार्क मिळाले असते तर मला त्याचा खूप आनंद झाला असता, पण तिला ते मिळाले नाहीत,  खेडेगावात राहून कसलेही क्लास न करता सुलु ने स्कॉलरशिप मिळवली याचा पण मला खूप आनंद आहे. यापुढे पण मी तिच्या मागे असणार. तिला चांगले शिक्षण मिळावे म्हणून मी तिला प्रोत्साहन देत राहणार.

नंदूच्या आईचा जळफळात झाला, तिने आपल्या नवऱ्याला पण सांगण्याचा प्रयत्न केला, पण नंदूच्या बाबांनी पण तिच्याकडे दुर्लक्ष केले.

दहावी परीक्षेतही नंदू कशीबशी पास झाली उलट मेस्त्रीची सुलु जिल्ह्यात दुसरी आली, परत एकदा नंदूचे आजोबा तिच्या पाठी उभे राहिले, सुलुच्या आई बाबांना पटवून सुलूला तालुक्याच्या गावी अकरावी बारावी साठी पाठविले.

दहावी जेमतेम पास झालेली नंदू पण त्याच शाळेमध्ये अकरावीसाठी आली, पुन्हा नंदू आणि सुलु एका बेंचवर बसू लागल्या, सुलु गावातून st ने जाऊ लागली, पण गावातून फक्त जाणाऱ्या दोन एसटी बसेस होत्या, त्यामुळे सुलूची पंचायत होऊ लागली, संपले की दुपारी चार वाजेपर्यंत गावी जाण्यासाठी गाडी नव्हती. त्यामुळे उपाशी सुलु एसटी स्टँडवर एसटी  ची वाट पहात बसू लागली.

नंदूच्या आजोबांच्या हे लक्षात आले, ते आपल्या मुलाच्या बिऱ्हाडी आले आणि आपल्या मुलाला म्हणाले

आजोबा –अरे मिलिंद, त्या मेस्त्रीच्या सुलु चो वेळ st ची वाट बघण्यात जाता, पाच नंतर ता दमान घरात पोचता, अशाने तेचो अभ्यास कसो व्हतलो, तसा नंदू आणि सुलु लहानपणापासून मैत्रिणी, आता एका वर्गात असत एका बेंचवर बसतात,तेव्हा सुलु हय तुमच्या कडे रवान शाळेत गेला तर…

मिलिंदप्रदीप केळूसकर – हो चलत ना बाबा..

एवढ्यात नंदूची आई किचन मधून बाहेर आली.

– क्रमशः भाग पहिला 

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares
image_print