मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “प्रेमपत्र…” ☆ सुश्री शीला पतकी ☆

सुश्री शीला पतकी 

? मनमंजुषेतून ?

☆ “प्रेमपत्र…” ☆ सुश्री शीला पतकी 

प्रेमपत्र – – – 

पुणे येथील ‘ गाणे मनामनांचे ‘ या संस्थेकडून आजी आजोबांसाठी प्रेमपत्र स्पर्धा आयोजित करण्यात आली होती त्यामधून पाच सर्वोत्तम पत्राची निवड केली जाणार होती. या स्पर्धेत भाग घेण्यासाठी माझ्या एका मैत्रिणी च्या भाच्याने मला आग्रह केला आणि माहिती पाठवली. मग मी या स्पर्धेसंबंधी विचार करायला लागले…. प्रेम पत्र तर आजपर्यंत कोणाला लिहिले नाही… त्याचा विचारही केला नाही… विषय अवघड… लेखणी थांबली…! आता काही अनुभवी लोकांचा सल्ला घ्यावा म्हणून एका गटातील मैत्रीणीला फोन केला… ती म्हणाली, “नाही हो शीला ताई असलं काय नसतंय बघा मी तर कधी लिहिलं नाही” आता अनुभवी लोकांकडून पहिला नकार आला. माझ्या एका मैत्रिणीला… तिचा प्रेम विवाह होता…. तिला विचारलं…. एकाच गावात असल्यामुळे आम्ही कधी पत्र लिहिले नाही… तिने उत्तर दिले. विषय असा होता की ज्याच्यावर तुमचे प्रेम आहे अशा कुणालाही तुम्ही पत्र लिहा भावाला बहिणीला आईला देशाला मैत्रिणीला.. प्रेम पत्र म्हणले की प्रेम पत्र हे प्रियकरालाच लिहिले पाहिजे अशी माझी तरी धारणा…. मग मी विचार करून प्रेम पत्र लिहिण्याचा निर्णय घेतला… कलावंताला जशा सगळ्या भूमिका निभावता आल्या पाहिजेत तशा लेखकाला कोणत्याही विषयावर लिहिता आले पाहिजे. असे मनाला बजावले आणि प्रेम पत्र लिहायला सुरुवात केली जरा संकोच वाटत होता. ज्याचा कधी तरुण वयात विचार केला नाही ते आता म्हातारपणी विचार करायची वेळ आली…. पण शेवटी स्पर्धा होती त्यातून पाच सर्वोत्तम पत्राची निवड केली जाणार होती..! पारितोषिक हा भाग आता महत्त्वाचा राहिला नाही आता एक्सेप्ट द चॅलेंज हा भाग महत्त्वाचा आहे, किंबहुना आता या विषयापुरता तरी तो वाटला आणि मग लिहायला बसले. पत्रलेखन पूर्ण झाल्यावर अनुभवी माणसांचा थोडा सल्ला घेतला… बरे झाले आहे का? असे विचारले.. काही चुकत तर नाही ना याबद्दल खात्री केली आणि ते स्पर्धेला धाडले……… आणि मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की पाच सर्वोत्तम पत्रामध्ये माझ्या पत्राची निवड झाली असा एक मेसेजही फेसबुक वर आला मला आनंद यासाठी झाला की अनुभवातून लिहिणारी मी किंवा अनुभवामुळे लेखन करणारी मी पण या विषयात मात्र प्रचंड कल्पनाशक्तीचा वापर करून मी हे लेखन केले आहे आपल्या ग्रुप वर ते पत्र टाकते आहे वाचा आनंद घ्या त्रुटी असतील तर कळवा म्हणजे पुढे काही स्पर्धा असतील तर सुधारणा करता येतील माझ्या लेखनाला आपले सर्वांचे प्रोत्साहन नेहमीच लाभले आहे त्यातूनच ही प्रगती….!

धन्यवाद! – ते पुरस्कारप्राप्त पत्र असे – – –

प्रिय वसुधा,

लग्नाला 40 वर्षे झाली पण तुला प्रेम पत्र काय साध कार्डही लिहणे जमलं नाही. वसु आपल्यामध्ये व्यक्त होण्याची पद्धतच नाही पण आज मात्र मी ठरवलंय माझ्या मनातलं सगळं तुला सांगायचं… ऐकतेस ना..?

वसु मी पहिल्यांदा तुला पाहायला आलो ना माझ्यासमोर एक वीस वर्षाची लांब सडक केसांची किंचित सावळी टपोऱ्या डोळ्यांची एक गोड मुलगी हातात ट्रे घेऊन आली.. खरं सांगू मी त्याच वेळेला खलास…. मनाने ताबडतोब सांगितलं… “अरे हीच माझी वहिदा” मन गुणगुणायला लागलं… चौधविका चांद हो या आफताब हो.. हृदयात वाजे समथिंग… डोक्यात घंटा वाजायला लागल्या.. मंजुळ सुरेख… माझी पसंती तेव्हाच झाली.

माझ्या तीन खोल्यांच्या घरात निशिकांतची बायको म्हणून तू प्रवेश केलास.. घरात कसला प्रत्येकाच्या मनात प्रवेश केलास. तीन खोल्याचं छोटसं घर सगळं तू आपलं केलं. आईच्या मार्गदर्शनाखाली तू सगळं उत्तम निभावून नेलं. वसु त्या तीन खोल्यात आपल्याला म्हणावा तसा एकांत मिळत नव्हता. मग काय नजरेचे खेळ! जेवायला बसल्यावर मी चटणीचे बोट जिभेवर ठेवून टक् टक् करायचं आणि ओठावर बोट ठेवायचं आई ओरडायची… काय रे आवाज करत जेवतोस… पण तो आपला एक वेगळाच इशारा होता. तू पटकन तोंड लपवून पाठमोरी होऊन हसायचीस. आणि हातावर सुपारी ठेवताना हळूच चिमटा काढायची… मी आई गss असं ओरडायचं.. आई म्हणायची काय रे…? काही नाही ऑफिसला चाललोय… किती रोमँटिक दिवस होते ना!

ऑफिसातून येताना मी तुझ्यासाठी गजरा आणायचो ते कोणाला कळू नये म्हणून देवासाठी मोगरा असलेली फुलपुडी आणायची. मग ते आठ बाय आठच्या खोलीत… खोलीभर तो मोगरा दरवळायचा मग काय…

मी मोगरा माळवतो तुला.. आणि शब्द ओठात घोळतो

शब्द रेंगाळतो जिभेवर.. मौन संवाद साधतो //

प्रेमाचा संवादच आगळा.. देह सारा बोलतो..

शब्दांचे मुके पण तिथे जरी.. भाव संवाद साधतो//

अशी मुक्या संवादाची सुरुवात व्हायची शब्दाच्याही पलीकडची भाषा समजण्याचे आपले प्रेम.. कधी बोलावच लागलं नाही. पण या मोगऱ्या पलीकडे मी तुझी कोणतीच हौस करू शकलो नाही ना?

वसु पण खरं सांगतो माझ्या आयुष्यात तू आलीसआणि तू माझी प्रेरणा झालीस कुणासाठीकाही करून दाखवावं अशी तू एकटी होतीस तुझ्यामुळे माझा आत्मविश्वास दुणावला पुढे पुढे जात राहिलो आणि मागे तू धावत राहिलीस बिनतक्रार.!

गाण्यातली विशारद तू गाण्याचे क्लास घरी घेताना तुझा रियाज व्हायचं तेवढाच खूप वाटायचा तुझ्या मांडीवर डोकं ठेवून झोपाव तू एखादी सुंदर चीज माझ्यासाठी गात रहावी पण असं आपल्याला हे जमलं नाही ना. कधी चार माणसाच्या घरात असं प्रेम करता येत नाही म्हणतात, खरं आहे ते! मी तुला काही देऊ शकलो नाही पण प्रेम मात्र भरभरून दिल. जागेचा अभाव आणि माणसांची रेलचेल असलेले छोट्या घरात आपले प्रेम मात्र अभावातल्या ऐश्वर्या सारखे वर्धिष्णू झाले मग त्या प्रेमात थोडी असूया आलीच… तुझा मामेभाऊ सुभाष जेव्हा आला आणि तुझ्याशी सुधी सुधी म्हणून बोलायला लागला तेव्हा माझा संताप झाला होता, पण एक दिवसासाठी आला म्हणून गप्प बसलो. तुला आठवतंय त्यावेळेला माझा राजकपूर झाला होता. मी एक गाणं गुणगुणत होतो.. तूम अगर मुझको ना चाहो तो कोई बात नही तुम किसी गैर को चाहोगी तो मुश्किल होगी…. तो पोपट्या तुझा भाऊ असल्यामुळे तुझा हात धर धरून बसवत होता आणि बोलत होता.. सुधी असं सुधी तसं माझा जरा तोल गेलाच. मी म्हणलं.. “अरे वसुधा नाव आहे तिचं “तो म्हणाला, “चालते हो भाऊजी मी हिला नेहमीच सुधी म्हणायचो” तो गेला तेव्हा मी खूप रागावलो होतो तुझ्यावर आणि तू हसत होतीस. म्हणालीस, ” आज काहीतरी जळलं बाई घरात “तो रुसवा फुगवा दोन दिवस चालला होता आणि मग तू माझ्यासाठी खास विणलेला स्वेटर मला सरप्राईज भेट दिलास त्या स्वेटर पेक्षा तुझ्या प्रेमाची उब होती. प्रेमात मी पुन्हा एकदा न्हाऊन निघालो… सगळा रुसवा गळून गेला फक्त उब शिल्लक. वसु तु मला एक नाव ठेवलं होतं फक्त आपण दोघं असतानाच तू मला हाक मारायची… *निक* निशिकांतचा निक झालो…! आपण पुढे आपल्या मुलांच्या जबाबदाऱ्या आईच आजारपण यात सगळं हरवून गेलो नाही? मग तू मला बाबा म्हणायला लागलीस कारण आता मुलांचा बाबा झालो होतो ना मी…! दिवस भराभर सरले केसातली चांदी गडद झाली. वसु तुला आठवतं आई गेली त्या रात्री मी पार कोलमडलो होतो तिचं सगळं झाल्यानंतर मी एके रात्री तुझ्या मांडीवर डोकं ठेवून हमसून हमसून रडलो होतो तेव्हा तू माझी पत्नी नव्हतीस तर आई झाली होतीस तेव्हा हे वाक्य मला जास्त पटलं की” स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंत कालची माता असते”… अगं किती भूमिका निभवल्यास बायको आई बहीण आणि छान मैत्रीण पण मी मात्र तुला प्रेमाचे दोन शब्द काही मोकळेपणाने बोलू शकलो नव्हतो… पण तुला माझ्या डोळ्यात, स्पर्शात हे बहुदा दिसत असावं म्हणूनच इतक्या समाधानांन माझा संसार मार्गी लावलास… आता तुझे चांदण्याचे हात सखे माझ्या गळा हे असेच निरंतर ठेवशील ना? आता आपण दोघेच… अभी ना जाओ छोडके के दिल अभी भरा नही… आता एकमेकांपासून दूर होणे नाही आता देवानंद नाही आता फक्त तुझा निकी आता इतकंच खरं आहे की हमे तुमसे प्यार कितना हम नही जानते मगर जी नही सकते तुम्हारी बिना हेच खर. खरं तर आपलं प्रेम शब्दात मांडण्याच्या पलीकडे पण जमतील तेवढे शब्द जमवून लिहिले आहेत. वसु खाली माझ्या ओठाचा एक ठसा उमटवलाय त्याच्यावर तुझे ओठ टेकव उरलेलं सगळं माझ्या मनातला आपोआप तुझ्या हृदयात उतरेल करशील ना एवढं….?

तुझाच निकी उर्फ निशिकांत उर्फ अहो ss

© सुश्री शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका, सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “दोनशे साठ रुपयांचे कर्ज…” ☆ डॉ. धनंजय देशपांडे ☆

डॉ. धनंजय देशपांडे

? मनमंजुषेतून ?

☆ “दोनशे साठ रुपयांचे कर्ज…” ☆ डॉ. धनंजय देशपांडे 

 – – जे आजही माझ्या डोक्यावर आहे.

पुण्यात आल्यावर आधी भाड्याच्या घरात होतो, नंतर स्वतःचा फ्लॅट झाला.

ऑफिस देखील आधी भाड्याचे व नंतर स्वतःचे झाले. दोन्ही मालमत्ता अर्थातच कर्ज काढून घेतलेल्या मात्र घराचे हप्ते वेळेवर अन ऑफिसचे तर वेळेपूर्वीच संपवले.

पण तरी मी स्वतःला आजही कर्जमुक्त मानत नाही. त्याचे एक कारण आहे आजही मी आज ही मी दोन माणसांचे मिळून दोनशे साठ रुपये देणे बाकी आहे. त्याचीच हि चित्तरकथा.

घटना आहे १९८८ सालाची. अभिनव चित्रकला महाविद्यालया ची शेवटच्या वर्षाची परीक्षा त्या काळात मुंबईच्या जे. जे. मध्ये व्हायची.

दहा दिवस मुंबईत राहावं लागायच. परीक्षेची वेळ सकाळी दहा ते संध्याकाळी पाच अशी असली तरी त्यावेळेत तिथं असलंच पाहिजे असं नसायचं.

एकूण दहा दिवसात चार पेपर तुमच्या सोयीने सोडवायचे. त्यामुळे कधी कुणी लेट यायच तर कुणी लवकर संध्याकाळी लवकर जायचे.

दहा दिवसासाठी एकूण खर्च म्हणून अडीचशे रुपये घेऊन पुण्यातून मी मुंबईत गेलेलो. माझ्या मोठ्या भावाचे एक मित्र सायन इथं राहायचे. त्यांच्या घरी माझी सोय त्याने करून दिलेली. तिथून जे. जे. ला रोज जाणे येणे करायचो.

पहिल्या दिवशी लोकल ट्रेनने तिकीट वगैरे काढून व्यवस्थित निघालो. जे. जे. कॉलेजच्या स्टेशन वर उतरलो.

हाताशी थोडा वेळ होता, तर लिंबूसरबत घ्यावे म्हणून तिथल्या गाडीवर गेलो. त्यावेळी काहीतरी तीन रुपयात शरबत मिळायचे. तर पैसे काढून देण्यासाठी खिशात हात घातला अन शॉक बसला. कारण माझा खिसा ट्रेनमध्ये मारला गेला होता.

माझ्या डोळ्यासमोर अंधारी आली. हातापायात लटलट सुरु झाली. कारण आता पुढचे दहा दिवस जगायचं कस? आता वर्ष वाया जाणार की काय पुन्हा? कोण देणार या मुंबईत मला पैसे? असं सगळं आठवून डोळ्यात पाणीच आलं. काहीच सुचेना.

माझी हि अवस्था त्या सरबतवाल्या भय्याला कळली. त्याने मायेने विचारलं,

‘क्या हुआ बेटा? ’

मला मग अजूनच रडायला येऊ लागलं. भय्याने मग तिथल्या स्टूलवर बसवलं.

आधी साधं पाणी दिलं. मी घटाघटा प्यायलो. त्याला सांगितलं की, ‘ मेरी जेब किसीने काटी है. ’

मी मुंबईत नवीन असल्याचे त्याने ओळखून त्याने इतर चौकशी केली की, कुठून आलास, मुंबईत काय काम काढलं वगैरे.

मी ते सगळं सांगितलं अन आता माझ्या परीक्षेचे काय? हि काळजी बोलून दाखवली.

त्याने विचारलं, ‘ बम्बईमे और कोनो नाही का पहचान में? ‘

मी म्हंटल, ‘ एक मावस भाऊ आहे. गोरेगावला राहतो अन दादरला महाराष्ट्र बँकेत आहे. पण त्याचा डिटेल पत्ता माहित नाही. ‘

यावर भय्याने काय करावं?

आधी मला शरबत प्यायला दिलं. ‘ पीओ बेटा, पैसे नाही लुंगा. ’

अन नंतर त्याने त्याच्या खिशातून दहा रुपये काढून मला दिले व म्हणाला, ‘ दादर को जावं ट्रेन पकडकर, वहा किसी पुलिस से बँकका पता पूछो. भाई मिल जायेगा. आनेजाने का भाडा दिया है. अगर उहा काम नही हुआ तो यहा फिर आ जाना. कुछ करेंगे ‘

माणसात देव असतो, हे मी नेहमी मानत आलो ते याच कारणासाठी. अन त्या भय्याने सांगितल्यानुसार दादरला गेलो. पोलिसाने नीट पत्ता समजावून सांगितल्यावर मी बँकेत गेलो. आत जाताच समोरच भाऊ दिसला.

तोही चकित, मी अचानक आलेलं पाहून. त्याच्या समोर जाऊन बसलो अन थोडक्यात परीक्षेसाठी आलोय. सायंनला सोय झालीय राहण्याची वगैरे सांगताना परत एकदा डोळ्यात पाणी आलं.

त्याला बहुतेक अंदाज आला असावा. कारण त्याने थेट विचारलं की, ‘ पाकीट मारलं गेलंय कां? ‘ मी मानेनेच हो म्हणून सांगितलं.

त्याने फक्त इतकंच विचारलं, किती होते खिशात, मी सांगितलं अडीचशे. भावाने काहीही न बोलता त्याच्या खिशातून अडीचशे काढून मला दिले.

मी म्हटलं, ‘ पुण्यात गेलो की लगेच मनीऑर्डरने पाठवतो. ’

तो म्हणाला, ‘ असू दे. ते नंतर पाहू. तू आता शांतपणे परीक्षेला जा. मन शांत कर. अन अजून काही लागलं तर फोन करून कळव. ’

– असं म्हणून त्याने बँकेचे त्याचे कार्ड मला दिले. ते घेऊन मी निघालो. जीव भांड्यात पडला होता.

पटकन ट्रेन पकडून पुन्हा जे. जे. ला आलो. तरी या घोळात माझे दोन अडीच तास गेले होते. मात्र वेळेचं बंधन असं नसल्याने ती काळजी नव्हती.

त्या दिवशीचा पेपर सोडवणे सुरु केले. म्हणजे पोस्टर करण्याचा तो विषय होता. अन संध्याकाळी बाहेर पडल्यावर आधी त्या सरबतवाल्या भय्याकडे गेलो. खिशातून अडीचशे मधले दहा रुपये काढून त्याला दिले.

मनाची तयारी केलेली की, आता २४० रुपयांत भागवायच आहे. ते जमवू म्हटलं. अन भय्यापुढे दहाची नोट काही न बोलता धरली.

सकाळचा मीच तो मुलगा, त्याने ओळखलं. प्रसन्न हसून म्हणाला, ‘ काम हुई गवा न? ‘ मी हो म्हटलं अन त्याला सांगितलं की, ‘ ये आपके दस रुपये. ’

तो म्हणाला. ‘ बेटा, रहने दो, फिर कभी किसी को जरुरत पडे तो उसे तुम काम आ जाना. बास, मेरे पैसे उसी दिन मुझे मिल जायेंगे. ’

मी थक्क झालो. एक उच्चपदस्थ व उच्च शिक्षित मोठा बँकेतील माणूस अन एक फुटपाथवरचा अशिक्षित भय्या पण दोन्ही त्यावेळी मला देवाची रूपे दिसली.

नंतर पुण्यात आलो. नोकरीला लागलो. त्याच काळात तो मुंबईचा भाऊ एकदा माझ्याकडे पुण्यात आला तेव्हा आवर्जून त्याला ते अडीचशे परत देत होतो तर तो म्हणाला,

‘मोठे झाले आता बाळासाहेब तुम्ही. असू द्या पैसे तुमच्याकडे. नंतर कधी कुणाला तरी अशीच मदत कर. बास. ’

अगदी हीच सेम भावना त्या भय्या’ने मला बोलून दाखवलेलं आठवलं अन मी नतमस्तक झालो.

– – तर, हेच ते माझ्यावर अजून असलेले अडीचशे प्लस दहा असे दोनशे साठ रुपयाचे कर्ज. जे अद्याप फेडू शकलो नाहीये.

…… काही काही ऋण अशीच असावीत आयुष्यात जी फेडण्यापेक्षा मिरवण्यात आनंद वाटावा असे हे माझे कर्ज

© डॉ. धनंजय देशपांडे (dd)

(सायबर सिक्युरिटी तज्ञ, चित्रकार, लेखक, समुपदेशक, निवेदक)

मो न. ९४२२३०४३४४ 

1) Global Cyber Crime Helpline National Award winner

2) Digital Hero of the year National Award winner

3) HOD: Cyber Awareness Foundation, Maharashtra State

4) Mentor: Pune University (SPPU), CANADA and UK

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ संकल्प… ☆ सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

??

☆ संकल्प …  ☆ सौ. उज्ज्वला केळकर

संकल्प – – 

संकल्प करणे, म्हणजे एखादी गोष्ट नियमितपणे, न चुकता, खंड पडू न देता करणे. मला लहानपणापासून संकल्प करण्याचा नाद होता. मी ५वी-६वीत असेन तेव्हा. आम्ही मैत्रिणींनी नवं वर्षाचा संकल्प केला, पहाटे उठायचं. फिरून यायचं. मग तासभर अभ्यास करायचा. मग नेहमीच रूटीन. ३-४ दिवस तसं केलंही. त्यानंतर मात्र आमचा संकल्प आमच्यासारखाच ऊबदार पांघरुणात गुडूप झाला. मैत्रिणींना विचारलं, ‘तुम्ही जाता का रोज फिरायला? ’ त्यांचंही माझ्या सारखंच झालं होतं. ४-५ दिवसात सगळ्यांचाच संकल्प गारठून गेला होता.

शाळेत असताना, मी दरवर्षी जूनमध्ये संकल्प करी, की यंदा गृहपाठ वेळच्या वेळी आणि घरीच करायचा. काही आठवडे, महिने ते सुरळीत चालू राही. पुढे पुढे कधी नवीन छान पुस्तक मिळालं म्हणून, टी. व्ही. ची सिरिअल चांगली आहे म्हणून, बऱ्याचदा झोप आलीय म्हणून, गॅदरिंगच्या वेळी कार्यक्रमाची प्रॅक्टीस म्हणून यात खंड पडत जाई आणि माझा संकल्प गडबडून जाई. मग शाळेत थोडं लवकर येऊन, कुणाचं तरी पाहून गृहपाठ पूर्ण करायची लगबग चालू व्हायची. किंवा गृहपाठ मोठा असेल, तर तो न होण्यामागची खरी-खोटी कारणं शोधायची. पण एवढा मात्र खरं, मी दर वर्षी, जूनमध्ये नव्या उत्साहाने हा संकल्प करायचीच!

शाळेत असताना मी एकदा संकल्प केला होय, ८वीत असेन बहुधा मी तेव्हा, शाळेत कधीही कुणाशीही भांडायचं नाही. सगळ्यांनी ‘मिलनसार’ मुलगी म्हणून माझं कौतुक केलं पाहिजे. बरेच दिवस हा संकल्प निभावला. कारण ठरवलं होतं, भांडणं झाली, तरी आपण नमतं घ्यायचं. आपली चूक नसली तरी… एकदा वार्षिक क्रीडा सामने चालू होते. ८अ विरुद्ध ८ब ‘खो खो’ची मॅच होती. आम्ही दोन्ही वर्गातल्या मुली भवतीनं गोल करून खेळाडूंना प्रोत्साहन देत होतो. आमच्या वर्गाच्या टीमची कॅप्टन मीना. छानच खेळत होती. मी म्हंटलं, ’काय छान खेळतेय मीना! ’ माझ्या शेजारीच ब वर्गातली मधुरा उभी होती. ती म्हणाली, ‘नीता जास्त चांगली खेळतेय! ’ मी म्हंटलं, ‘नाही मीनाच जास्त चांगली खेळतेय. ’ ‘मुळीच नाही नीता… ‘ मीना… नीता… मीना… नीता… ’ आणि जुंपलीच की आमची. मॅच संपली मीना-नीता गळ्यात गळे घाळून खो खोच्या मैदानातून बाहेर आल्या. आमचं आपलं ‘मीना… नीता… ’ चालूच. मग काय माझ्या संकल्पाची झाली ना ऐशी न् तैशी!

पुढे कॉलेजमध्ये गेल्यावर संकल्प केला, आता स्टडी रूममध्ये फक्त अभ्यासाची पुस्तके वाचायची किंवा संदर्भ ग्रंथ बघायचे. पण काऊंटरवर एखादा देखणा कविता संग्रह किंवा कथा संग्रह किंवा कादंबरी दिसली की आपोआपच ती पुस्तके चाळली जात. आणि नकळतच त्यातले पुस्तक नोंद करून घेतले जाई आणि मी बैठक जमवून वाचायला सुरुवात करी. पानामागून पाने उलटली जात आणि संकल्प बिचारा बापुडवाणा होऊन मान खाली घालून बसे.

याच वयात काही कविता आवडणार्याी आणि करणार्याासुद्धा काही मैत्रिणी भेटल्या. मग आम्ही सगळ्यांनी संकल्प केला, रोज एक कविता करायची. पहिले दोन –तीन दिवस काही तरी नवे नवे सुचत गेले. नंतर नंतर काही सुचेना. कविता संग्रह चाळून नवीन विषय शोधत राहिलो. ‘र ला र आणि टला ट’ जुळवून कविता करत राहिलो. मग तेवढेही जमेना. भवतीनं अनेक विषय दिसत होते. सुचतही होते, पण ते कवितेत यायला मात्र तयार नव्हते. शेवटी नाईलाजाने रोज एक कविता करायची, निदान चार ओळी तरी लिहायच्याच, या संकल्पाला पूर्णविराम द्यावा लागला. तशी अजूनही मी कविता करते म्हणा, पण रोज एकाचं सृजन व्हावं, अशी प्रतिभा देवाने नाही दिली.

एकदा संकल्प केला रोजनिशी लिहायची. रोज जे घडलं, ते लिहून ठेवायचचं. अनेक थोरा-मोठ्यांनी रोजनिशा लिहीलेल्या आहेत. त्यातल्या काही ना काही, कोणत्या ना कोणत्या स्वरुपात छापूनही आल्या आहेत. मग मी १ जानेवारीपासून मोठ्या उत्साहाने रोजनिशी लिहायला लागले. वाटलं, न जाणो आपल्याही रोजनिशीला हे भाग्य लाभेल. पण ८-१० दिवस रोजनिशी लिहिल्यावर लक्षात आलं, सकाळी उठले. कॉलेजमध्ये गेले. स्टडीत बसून आभ्यास केला. घरी आले. जेवले. टी. व्ही. बघितला. झोपले. रोज तेच ते. तेच ते. कधी बदल म्हणजे तास बुडवून टेबल-टेनीस खेळले. किंवा ‘मॅटिनीला ‘प्यासा‘ बघायला गेले. चित्रपटाने भारून टाकले. गाणी तर… अहाहा… कधी तरी बदल म्हणजे, आज अभ्यास सोडून कथा-कादंबार्याण वाचते, म्हणून बाबा रागावले. नवीन ड्रेस घ्यायला आई नाही म्हणाली, म्हणून मी रूसले. असे सटर फटर बदल. मनन, चिंतन म्हणतात, ते काही घडतच नव्हतं, तर रोजनिशीत कसं उतरणार? शेवटी तेच तेच लिहून मी इतकी कंटाळले, की माझं रोजनिशी लेखन मी थांबवलंच!

लग्नं झालं. नव्या नवलाईचे अद्भूतरम्य, स्वप्नील वगैरे, ‘तू म्हणशील तसं’ म्हणायचे दिवस सरले. वास्तव जीवनात ‘मी म्हणेन तसं’ असं ‘तू.. तू… मैं… मैं’ चालू झालं. ‘नळ का बंद केला नाहीस? दिवा का मालवला नाहीस? ’ अशा साधा साध्या प्रश्नांवरून वाद झडू लागले. त्यातून भांडणे होऊ लागली. या वादा-भांडणाला कंटाळून मी एकदा संकल्प केला, की नवर्या शी अबोला धरायचा. बोललंच नाही, तर वाद- भांडणं होतीलच कशी? टाळी एका हाताने थोडीच वाजते. दोन दिवस अबोल्यात गेले. तिसर्याह दिवशी हे ऑफीसमधून सांगत आले, ‘आज रात्री तुझे आई-बाबा आपल्याकडे येताहेत. आठवडाभर रहाणार आहेत. त्यांचं काही काम आहे. आता त्यांच्यादेखत न बोलता कसं रहाता येईल? विचारल्या प्रश्नांची उत्तरे तरी नकोत का द्यायला? झालं! माझा अबोला बोंबलला.

नेहमीसारखा संसार झाला. उतारालाही लागला. अधून मधून मला नवे नवे संकल्प करण्याची हुक्की येते. मी नव्या उत्साहाने ते करतेही पण… नित्यनेमाने होणार्याा पानगळीप्रमाणे ते गळून पडतात. माझे संकल्प हा घरात आता चेष्टेचा विषय झालाय. मुले दर वर्षी न चुकता १ ज्ंनेवारीला विचारतात, ‘आई, यंदा कोणता संकल्प करणार आहेस तू? ’ मी तितक्याच खेळीमेळीने उत्तरते, ‘बघू या. ठरवलं नाही अजून! ’

असाच एक संकल्प. मुलं आता मोठी झालीत. त्यांना सगळं कळतं. त्यांचे निर्णय ती घेऊ शकतात. त्यांना काही बोलायचं नाही. त्यांना काही विचारायचा नाही. काही सांगायचं नाही. रागावायचं तर नाहीच नाही. पण मुले शिस्तीच्या नावाखाली, त्यांच्या मुलांना बोलली, रागावली, कधी मारलंसुद्धा… नातवंडांचे चेहरे हिरमुसले झाले, की मग पडावं लागतंच ना मधे? अखेर, संकल्प महत्वाचा की नातवंडे महत्वाची? परिणाम काय? संकल्प सिद्धी नाही.

यंदा मात्र नव वर्षाला मी असा संकल्प केला आहे, की सिद्धीला जाईलच जाईल. कोणता संकल्प विचारताय? अहोsss यापुढे कधीही संकल्प न करण्याचा संकल्प केलाय मी यंदा!

© सौ. उज्ज्वला केळकर 

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो. 836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com 

≈संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी जडणघडण… जुनं ते सोनं  भाग – ७७ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ माझी जडणघडण… जुनं ते सोनं – भाग – ७७ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(सौजन्य : न्यूज स्टोरी टुडे, संपर्क : ९८६९४८४८००)

जुनं ते सोनं 

वास्तविक मी, आमच्यावेळी असे काही नव्हते बाई! असे म्हणणार्‍या सदरातील व्यक्ती नाहीच. मला बदल आवडतात. जे जे नवीन ते संपूर्णपणे स्वीकारले नाही तरी त्यांची ओळख असावी असे मला वाटते. तरुण पिढीबरोबर तसे माझे चांगले जमते. त्यांची बदललेली भाषा, बदललेली जीवनपद्धती, त्यांची वस्त्रसंस्कृती, खाद्यसंस्कृती, अत्याधुनिक तांत्रिकतेशी त्यांची असलेली निस्सीम मैत्री, याविषयी मला प्रचंड कुतुहल असते. खरोखरच जग किती बदलले याचे विलक्षण नवल वाटते.

पण तरीही ऐंशीच्या उंबरठ्यावर अनुभवाचा अधिकार गाजवून, सतत त्यांना धोक्याच्या सूचना देण्यात मला काही कर्तव्य बजावल्याचा आनंद होत नसतो. काळाप्रमाणे बदल हे होणारच.

अगदी त्यांच्या हातात हात घालून नाही शकलो तरी त्यांच्या पाठीमागे, कधी सोबतीने, कधी बरोबर जायला हवे असे मला वाटते.

माझ्या आयुष्याचा, मागे वळून जेव्हां मी मागोवा घेते, तेव्हा मला जाणवते की मीही बदललेच आहे की! लहानपणी मी पाटे वरवंटे, उखळ, जाते, चूल, शेगडी,

बंब या वस्तुंसोबत वाढले, ते सारे मला सोडून गेलेच की! का मी त्यांना सोडले? (पण आता ते अँटीक पीसेस म्हणून माझ्या घराचे डेकॉर आहेत.)

आता माझ्या घरात सगळी ईलेक्ट्राॅनीक गॅझेट्स आहेत आणि त्या केवळ चैनीच्या वस्तु नसून माझ्या आयुष्याच्या गरजाच बनल्या आहेत. मग हे नेमकं कधी झालं, कां झालं, या प्रश्नांच्या भानगडीत मी तरी कुठे पडले? ई मेल्स, व्हाॅट्सॲप, फेसबुक या परिवारात मीही पार बुडालेली आहे. किती बदलले मी? मी सुखी आहे का? आनंदी आहे का? निदान मजेत तरी आहे का याचा विचार तरी मी करते कां?

पण त्यादिवशी, एक गंमत झाली.

कुरीअरवाल्याने, एक सफेद रंगाचा, गुळगुळीत लिफाफा माझ्या हातात ठेवला. तो जेव्हां मी उघडला तेव्हां त्यात, रेघा असलेल्या कागदावर सुंदर अक्षरात लिहिलेले, माझ्या बहिणीचे पत्र होते. खरं सांगू! इतक्या वर्षांनी आलेले, धाकट्या बहिणीचे ते स्वअक्षरातले पत्र पाहून एक अनामिक आनंदाची लाट फुटली. वाचण्याआधीच

डोळे पाणावले. कितीतरी वेळ मी तिच्या अक्षरांवर नुसता हात फिरवत राहिले. एक प्रचंड उर्जा होती त्यात. ते निर्जीव नव्हते. उबदार होते. आणि मग जाणवले,

शेवटी, “जुनं तेच सोनं!”

ओहायोला मुलीकडे असताना, जवळच राहणार्‍या तिच्या मैत्रीणीने आम्हाला जेवायला बोलावले होते. अत्याधुनिक

पद्धतीने सजवलेले तिचे घर सुंदरच

होते. मात्र माझ्या लक्षात राहिले ते

तिच्या मुख्य दरवाजाजवळचे तुळशी वृंदावन! घरात शिरतानाच दिसलेली कोनाड्यातली गणपतीची मंगलमूर्ती!

जेवणाचा तर अगदी साग्रसंगीत बेत होता. शिवाय चकचकीत स्टीलची ताटे, वाट्या, चमचे, पेले यांची सुरेख मांडलेली पंगत! टेबलावर का असेना,

त्यात जुन्या आठवणी जपलेल्या होत्या.

श्रीखंडपुरी, बटाट्याची पिवळी भाजी, नारळाची चटणी, मसालेभात असा पक्का महाराष्ट्रीयन बेत. सर्वच तिने खपून केले होते. मला वाटले, माझ्या सारख्या जुन्या पिढीच्या प्रतिनिधीला आमंत्रित केल्यामुळे तिने हे सारे केले असावे. पण जेवताना तीच म्हणाली,

“काकू मला हे फार आवडतं. या परंपरा इथे वाढणार्‍या माझ्या मुलांनाही कळायला हव्यात ना? शेवटी ना काकू ते काय म्हणतात ना, जुनं ते सोनं, तेच खरं! “

बरं वाटलं मला. कुठेतरी धागे अतूट

असल्यासारखे वाटले.

दरवर्षी आम्ही आमच्या गावी जातोच. खानदेशातले एक खेडेवजा शहर. तसा आता जुना वाडा राहिला नाही. तिथे राहणार्‍या भावांनी नव्या पद्धतीचे घर बांधले. अधुनिकीकरण केले. मात्र नवे जुने गळ्यात गळे घालून आहेत.

आम्ही गेलो की माझी जाऊ अंगणात मस्त चूल पेटवते. भांड्याला मातीचं बुड लावून, त्यात एखादा सणसणीत रस्सा बनवते. लोखंडी तव्यावरच्या, चुलीच्या जाळावर शेकलेल्या, खरपूस गरम भाकर्‍या आणि खास लाकडी बडगीत ठेचलेला हिरव्या मिर्चीचा

ठेचा! तोडच नाही त्याला. आणखी एक.

चकचकीत घासलेल्या तांब्याच्या बंबातल्या कडथ पाण्याचे स्नान! सारेच अपूर्व!

गावात फेरफटका मारताना कुणी,

“राम राम पावनं! “म्हणताना ऐकले की,

हाय, हॅलो, व्हाट्सप, चि… ल, हे शब्द किती पोकळ वाटतात! गावरान शब्दातला गोडवाच न्यारा!

कोरोनाच्या काळात, सुरक्षित अंतर ठेवा, या नियमाचे पालन करताना आवर्जून सांगितले गेले, नको शेकहँड, नको मिठ्या, नको मुके. हात जुळवून केलेला नमस्कारच पुरे. मग ही तर भारतीयांची पूर्वापार चालत आलेली संस्कृती.

बाहेरुन आलेल्या माणसाने

घरात येण्यापूर्वी परसातल्या नळाखाली पाय धुवूनच यायचे.. अशा कितीतरी

जुन्या विचारांची दारे पुन्हा उघडली आणि त्यातून सुवर्णमयी वारे वाहू लागले. ”जुने जाऊद्या मरणालागूनी”

असे म्हणायच्या ऐवजी तेच जुने सोन्यासारखे वाटू लागले.

काल लेकीने व्हाॅट्सॲपवर फोटो पाठवले होते.

दोन शुष्क झाडाची खोडे, शंकुच्या आकारात बार्बेक्यु ट्रेवर बाहेरच्या डेकवर ठेवली होती. त्यांना फुलापानांनी सजवले

होते. नारळ बांधला होता. पायाशी रांगोळी रेखाटली होती. होळीपूजनासाठी

तबक सजवले होते. पुरणपोळीचा नेवैद्य दाखवला होता.

त्या पेटत्या नाविन्यपूर्ण होळीची चित्रं पाहताना मला खूप मजा वाटली.

खाली कॅप्शन होती.

“आमची अमेरिकन बार्बेक्यु होळी! “

हे विडंबन नव्हतं. एक गोड आनंदमयी अर्थपूर्ण संकेताचं ते पालन होतं.

अधुनिकतेत जुने सांभाळण्याची धडपड होती. मला खूप छान वाटले.

आयुष्याची, जुन्या नव्याची ही मिसळही मला खमंग रस्सेदार वाटली.

सृष्टीचाच नियम आहे. काहीच नाश

पावत नाही. होते ते फक्त स्थित्यंतर.

जुने—नवे—जुने हे एक चक्र आहे.

जुन्यातून नवे अन् नव्यातून पुन्हा जुनेच.

आणि मग आपण सहज म्हणतो,

“जुनं तेच सोनं! “

 क्रमशः…

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ इंद्रायणी काठी… ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

??

☆ इंद्रायणी काठी… ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

लहानपणी मला एक अभंग फार आवडायचा. त्यावेळी आजच्यासारखी गाणे ऐकण्यासाठी साधने नव्हती. कधी काळी रेडिओवर हा अभंग लागला की मी जीवाचे कान करून ऐकत असे. त्यावेळी त्या अभंगातला अर्थ फारसा कळत नसे. पण अभंगातील गोडवा आणि तळमळ मनाला स्पर्शून जात असे. तो अभंग होता जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा-

चंदनाचे हात पाय ही चंदन, परिसा नाही हीन कोणी अंग

दीपालाही पाठी पोटी अंधकार, सर्वांगे साकर अवघी गोड.

तुका म्हणे तैसा सज्जनापासून, पाहता अवगुण मिळेचिना.

सुमन कल्याणपूर यांनी आपल्या विलक्षण गोड आवाजात हा अभंग अजरामर केला आहे. आजही हा अभंग लागला की मी त्यात हरवून जातो. मग समोरचा माणूस माझ्याशी कितीही महत्वाचे बोलत असला तरी माझे त्याकडे लक्ष नसते. मग कधी कधी, “ अहो, मी काय म्हणतो? कुठे हरवलात? ” यासारखी वाक्ये ऐकण्याची मी तयारी ठेवतो. असो.

इंद्रायणीचा काठच सुपीक! जिथे तिच्या काठावर शेती, मळे बागबगीचे फुलले; तिथेच, त्याच काठावर विठ्ठल भक्तीचेही मळे फुलले. एक मळा फुलवला ज्ञानोबा माउलींनी आणि दुसरा तुकोबांनी. या मळ्यामध्ये विठ्ठल भक्तीचे अमाप पीक आले. आणि अवघ्या महाराष्ट्रातील जनता येथून विठ्ठल भक्तीचे बीज नेऊ लागली तरी ते कमी न होता उलट वाढतच गेले. इंद्रायणीच्या काठीच भागवत धर्माचा पाया रचला गेला. एकाने पाया रचला आणि दुसऱ्याने कळस.

ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस.

दोघाही संतांच्या शिकवणुकीत विलक्षण साम्य. दोघानाही समाजातील दांभिकतेची चीड. दोघानाही सर्वसामान्यांच्या उद्धाराची तळमळ. भागवत धर्माच्या रत्नजडीत मुकुटात हे दोन अमुल्य हिरे जडवलेले आहेत. समाजातले वाईट, अमंगल नष्ट व्हावे हीच आस या दोघांच्या मनी. असे करताना समाजातील वाईट, दुष्ट व्यक्ती नष्ट होऊ नये तर त्यांची दुष्ट वृत्ती नष्ट व्हावी म्हणून दोघेही प्रयत्नशील. ज्ञानोबा आपल्या पसायदानात म्हणतात-

जे खळांचीची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो

भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे ।।

आणि तुकोबाराय म्हणतात,

.. मेणाहुनी मऊ आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदू ऐसे.

… भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे माथी हाणू काठी.

अशा या सर्व संतांच्या शिकवणुकीत साम्य आहे. असे म्हणतात की परमेश्वराला सर्वत्र जाता येत नाही, म्हणून त्याने आई निर्मिली. तसेच मी म्हणेन की परमेश्वराला सर्वाना समजावणे शक्य नव्हते, म्हणून त्याने संतांची निर्मिती केली. सर्व संतांचे हृदय हे आईचेच हृदय. मातेच्या ममतेने संतांनी समाजाचे पालन पोषण केले. माता प्रसंगी बालकाला रागावतेही पण ते त्याच्या हितासाठी. तसे तुकोबा कधी कधी कठोर झाले. पण ते समाजातील अंधश्रद्धा, रूढी, दुष्ट चालीरीती यावर प्रहार करताना. आणि त्या काळात अशा प्रकारे लोकांना समजावून सांगण्याची आवश्यकता होती. लोक आपले कर्तव्य विसरले होते, गुलामगिरीची वृत्ती अंगी भिनली होती, ढोंगीपणा, बुवाबाजी यासारख्या गोष्टीना ऊत आला होता. लोक देवाची खरी भक्ती विसरले होते आणि नवस सायास करू लागले होते. अशा वेळी ‘ नवसे पुत्र होती, तरी का करणे लागे पती ‘ यासारखे परखड बोल तुकोबांनीच समाजाला ऐकवले. दांभिकतेवर प्रहर करताना ते म्हणतात-

… कथा करोनिया दावी प्रेमकळा, अंतरी जिव्हाळा कुकर्माचा

… तुळसी खोवी कानी दर्भ खोवी शेंडी, लतिका धरी बोंडी नासिकाची

… टिळे टोपी माळा देवाचे गबाळे, वागवी ओंगळे पोटासाठी

… गोसाव्याच्या रूपे हेरी परनारी, तयाचे अंतरी कामलोभ

… कीर्तनाचे वेळी रडे, पडे, लोळे, प्रेमेविण डोळे गळताती

… तुका म्हणे ऐसे भाषेचे महंत, त्यापाशी गोविंद नाही नाही.

तुकोबांची दुसरी पत्नी आवली. कजाग आणि कर्कश मावली. आणि तुकोबा विठ्ठल भक्त. एवढेच आम्ही जाणतो फक्त. पण खरे म्हणजे असे नव्हते. आवली असेल कजाग आणि कर्कश पण तुकोबांवर तिचे अतिशय प्रेम. म्हणतात ना ज्या व्यक्तीवर आपले प्रेम असते त्या व्यक्तीवरच आपण रागावतो. ते जेवल्याशिवाय ती तोंडात अन्नाचा कणही घेत नसे. आणि तुकोबांची योग्यता ती जाणून होती.

घरामध्ये खायला काही नसायचे. मुलेबाळे, पत्नी उपाशी. अशा परिस्थितीत एखाद्याला आपल्या संसारासाठी थोडा स्वार्थ सुचला असता तर ते क्षम्यच होते. पण तुकोबांनी त्यांच्याकडे चालून येणारा नजराणा नाकारला. शिवरायांनी त्यांच्याबद्दल अतीव आदराने तो पाठवला होता. पण ‘ काय उणे आम्हां विठोबाचे पायी ‘ या भावनेतून तो नम्रपणे नाकारला. त्यांनी त्या नजराण्यावर तुळशीपत्र ठेवले आणि म्हटले-

सोने आणि माती, आम्हा समान हे चित्ती

तुका म्हणे आले, घरी वैकुंठ सगळे.

आणि त्यांनी त्या नजराणा घेऊन आलेल्या सरदारांबरोबर निरोप पाठवला, ‘ शिवाजीराजांना सांगा! तुम्ही स्वतः आमच्याहून थोर आहात. तुम्ही आहात म्हणून देहू गावावर परचक्र आलेले नाही. हाच नजराणा मोलाचा. आम्हाला द्रव्य काय करायचे? आम्हाला काय उणे आहे?

असे हे निरिच्छ तुकोबाराय. त्यांचे अभंग तरले कारण ते खऱ्या अर्थाने ‘अ-भंग’ होते. काळाच्या कसोटीवरही ते टिकून राहिले. ते अजरामर आहेत आणि राहतील. वर्षानुवर्षे समाजाला मार्गदर्शन करीत राहतील.

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मनामनातील वेताळ… लेख क्र. ७ – ट्रेंड ☆ श्री संदीप सुंकले (दास चैतन्य) ☆

श्री संदीप सुंकले (दास चैतन्य) 

? मनमंजुषेतून ?

☆ मनामनातील वेताळ… लेख क्र. ७ – ट्रेंड ☆ श्री संदीप सुंकले (दास चैतन्य) 

ट्रेंड 

आज मनुष्य अनेक गोष्टी स्वतःला आवडते म्हणून करीत नाही, तर सध्याचा *”ट्रेंड* पाहून करतो असे म्हणावे लागते…

बरं यातील बरेचसे ट्रेंड हे आपल्या संस्कृतीच्या विरोधात जाणारे आहेत, असे आपल्या लक्षात येईल…! काळानुरूप सभ्यतेचे मापदंड बदलत असले तरी नीतीचे मोजमाप मात्र कोणत्याही काळात बदलत नसते…! आणि कोणत्याही ट्रेंडपेक्षा नीती कधीही उच्च असणारच, राहणारच आहे, त्यामुळे मनुष्याने त्याचा विचार आधी करायला हवा, नाही का?

पोशाख हा सर्वसाधारणपणे संस्कृतीचा निदर्शक मानला गेला आहे…! पोशाखामध्ये हे विशिष्ट शास्त्र दडलेले असते…! उदा. उष्ण कटिबंधात सैलसर पोशाख प्रामुख्याने आढळतो, तर शीत कटिबंधात घट्ट पोशाख आढळतो…! पण सध्या अंधानुकरण हा स्थायीभाव झाल्याने मनुष्य विवेक न करता अनुकरण करत आहे, पटतंय ना?

आपल्याकडे एक म्हण आहे.

‘ एक नूर आदमी.. दस नूर कपडा…’

थोडक्यात मनुष्याची पत प्रतिष्ठा मोजण्याचे, जाणून घ्यायचे पोशाख हे एक माध्यम आहे.

आपल्या प्रकृतीला, आपल्या संस्कृतीला, आपल्याकडील भौतिक परिस्थितीला झेपेल त्याप्रमाणे पोशाख परिधान करणे उचित नव्हे काय? पण याचा विचारच केला जात नाही असे पुढील उदाहरणातून आपल्या लक्षात येऊ शकेल…

आपल्याकडे साधारण मे महिन्यात लग्नाचा हंगाम असतो. रणरणत्या उन्हात, खास करून गावाकडे जिथे पंख्याची किंवा शीतलीकरण साधनांची सोय करणे शक्य नाही, अशावेळी, अशा ठिकाणी नवरदेव सुटबुट घालून घामाने थबथबून विवाह वेदीवर उभा रहात असतो… (कदाचित म्हणून त्या जागेला वेदी म्हणत असावेत…! ) त्या नवरदेवाची स्थिती काय होत असेल…?

लग्नाच्या नावावर लोकं करीत असलेले अतिरिक्त खर्च, सध्या निघालेले विवाहपूर्व छायाचित्रीकरणाचे फॅड, विवाहातील मौल्यवान संस्कार सोडून त्याला आपण सर्वांनी मिळून दिलेले एखाद्या तांत्रिक सोहळ्याचे अर्थात इव्हेंटचे स्वरूप, तसेच दैनंदिन जीवन जगताना मनुष्य खोट्या प्रतिष्ठेसाठी करीत असलेले अनावश्यक खर्च, या सर्व गोष्टी वेताळ बनून आपल्या मानगुटीवर बसल्या आहेत, नाही का?

यातून आपण बाहेर पडायला हवे.

पटतंय ना?

– लेख क्र. ७

© श्री संदीप सुंकले (दासचैतन्य)

मो. 8380019676

 ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘TIME BANK’ आज काळाची गरज… ☆ सुश्री संध्या बेडेकर ☆

सुश्री संध्या बेडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ ‘TIME BANK’ आज काळाची गरज… ☆ सुश्री संध्या बेडेकर ☆

माझी ताई रमा देशमुख, वय वर्षे सत्तर मुंबईत असते. घरी पंचाहत्तर वर्षाचे भाऊजी, मुलगा सुन, नातू सर्व आहेत. फक्त शनिवार रविवार सर्व जण जास्तीत जास्त वेळ एकत्र घालवायचा प्रयत्न करतात. बाकी आठवडाभर रोज सकाळी लग्न घाईच असते. आॅफिस, शाळेची रोज तीच वेळ जरी असली तरी घाई असतेच. ••••

हा सकाळचा वेळ म्हणजे ताई भाऊजींकरिता निवांत वेळ असतो. बगीच्यात बसून पेपर वाचणे, चहा घेणे, बगीच्यात झाडांना पाणी घालणे वगैरे काम ते करतात. एकदा मुलांची घाई संपली की ते आपल्या कामाला लागतात. जाता जाता अजय अनिता काही सूचना न विसरता करतातच. •••

” वेळेवर औषध घ्या. वेळेवर जेवा, अॅमेझोन चे आज एक पार्सल येईल तेवढे घ्या. दरवाजा उघडू नका. ग्रील मधूनच घ्या. ” वगैरे वगैरे. ••••

” मावशींना स्वयंपाकाचे सर्व सांगितले आहे. तुम्ही धावपळ करू नका, शाळेतून आल्यावर अनय आपल्या हाताने दूध घेईल. फक्त लक्ष असू द्या. जाता जाता अनिताच्या काळजीयुक्त सूचना असतातच. “•••

असा साधारण रोजचा संवाद असतो.

थोड्या फार फरकाने कित्येक घरी सकाळी असेच दृश्य असते.

मुलांना आई वडिलांची काळजी असतेच. नोकरी ही सांभाळायची असते. मुलांना त्यांच्या म्हातारपणाची सोयही करायची असते. सध्याची परिस्थिती बघता एकुलता एक मुलगा जरी असला, तरी त्याचे शिक्षण ट्युशन्स, ग्राउंड वर खेळायला नेणे, अशी बरीच कामं आईवडीलांना असतातच. •••

महागाई, प्राइवेट नोकरी बघता मुलांना काही कमी कष्ट, काळजी नसते. तरूण वयात जास्तीत जास्त काम करावे, पैशाची सोय करून ठेवावी असा त्यांचाही विचार असावा. •••

आई बाबांना ही सांभाळायचे असतेच.

अजय अनिता ला आईबाबांचा खूप आधार आहेच. घरी कोणी लक्ष देणारे असले की बरेच प्रश्न उद्भवतच नाही. रोज कुलुप लावायचे काम नसते. आधार असतो.

ताई भाऊजी आपलं ज्येष्ठत्व छान सांभाळतात. ••••

आज आॅफिस ला जाताना अजय सांगुन गेला, आज माझी महत्वाची मिटिंग आहे. तेंव्हा मी उशीरा येईन, संध्याकाळी जेवायला माझी वाट बघू नका. माझे बाहेरच जेवण आहे. ••••

ताईने स्वतः ला भजन, भिशी, जेष्ठ नागरिक संघ, वाचक मंच, मैत्रिणीं बरोबर गप्पा टप्पा यात बिझी ठेवले आहे. अनय चार ते सहा ग्राउंड वर खेळायला जातो. त्या वेळी भाऊजी आपल्या मित्राला सोबत म्हणून त्यांच्या घरी जाऊन बसतात. ••••

भाऊजींचे मित्र श्री मनोहर जोशी मागच्या वर्षी पडले व त्यांचे दोन्ही पाय अधु झाले. आता ते व्हील चेअर वर आहेत शरीर नाजूक झाले असले, तरी बुद्धी छान काम करते. ते बुद्धिबळ कॅरम, पत्ते छान खेळतात, मॅचेस बघायला त्यांना आवडत. बरोबर त्यांच्या मित्राचा साथ असला तर दोघेही मॅचचा आनंद घेतात. त्यांची चर्चा रंगते, जोशी साहेब रोज भाऊजींची वाट बघतात. ••••

त्यांचा एकुलता‌ एक मुलगा आनंद अमेरिकेत स्थाईक झाला आहे. पैशाची कमी नाही. त्याने चोवीस तास एजन्सी चा सहायक मदतीला घरी ठेवला आहे. तो जोशी काकांची सर्व काम छान प्रेमाने करतो.

पण मित्रांसोबत गप्पा मारणे विविध विषयांवर गप्पा, चर्चा ही पण बौद्धिक आवश्यकता असतेच. ते काम भाऊजी अगदी न चुकता रोज करतात. दोन तास आपल्या मित्रांसोबत घालवतात. आनंदला या गोष्टीची जाणीव आहे. तो मधून मधून भाऊजीं बरोबर बोलतही असतो. ••••

असा सर्व दैनंदिन कार्यक्रम सुरळीत चालू असताना, आज अचानक ताईचा पाय खुर्चीत अडकला आणि ती पडली. शेजारच्या पराग च्या मदतीने भाऊजींनी ताईला दवाखान्यात नेले. देवाच्या दयेने विशेष काही झाले नाही तरी पायाला दुखापत झाली होतीच. आता पंधरा दिवस तरी अजिबात चालायचे नाही अशी सूचना पण डॉक्टर ने दिली. ••••

भाऊजी नी मला, अनिताला फोन करून सांगितले. तसेच आनंद ला पण कळविले की आज मला तुझ्या बाबांना भेटायला जाण जमणार नाही. तरी लक्ष असू दे. •••

आजचा दिवस फारच घडामोडींचा गेला पण सर्व वेळेवर व्यवस्थित झालं. त्याच समाधान होत. ••••

दुसऱ्या दिवशीची सकाळ थोडी वेगळीच उजाडली. ताईची व्यवस्था कशी करायची?? यावर सर्व बोलत असतानाच बेल वाजली. अजयने दार उघडले तर दारात साधारण पन्नाशीच्या वयाच्या प्रसन्न व्यक्तिमत्त्व असलेल्या एक मावशी उभ्या दिसल्या.

त्या म्हणाल्या, ••• 

नमस्कार मी माणिक पाटील. मी TIME BANK हुन आले आहे. ताईंच्या मदतीला म्हणून मी आलेय. ••••

अजय मावशीं बरोबर बोलत असतानाच आनंदचा भाऊजींना फोन आला. त्याने Time Bank कडून सौ. माणिक पाटील पंधरा दिवसांसाठी घरी येण्याची बातमी दिली. •••

अजयला Time Bank बद्दल माहिती होती. पण मी, ताई भाऊजी आम्हाला काहीच कळलं नाही. •••

तेंव्हा अजयने खुलासा केला. तो म्हणाला, •••

अग!! जस आपण बॅंकेत पैसे जमा करतो ना, आणि गरजेनुसार ते पैसे वापरतो तशीच ही पण बॅंकच आहे. यात पैसे ऐवजी वेळ जमा करायचा व आवश्यकतेनुसार तो जमलेला वेळ आपल्याला वापरता येतो. ••

जगात चौतीस देशात ही बॅंक व्यवस्थित चालू आहे. मागे आनंद याविषयी माझ्या बरोबर बोलला होता. त्याने त्याच्या मित्रां बरोबर अशी बॅंक मुंबईत सुरु केली आहे. तसेच बंगलोर, राजस्थान मध्ये थोड्या फार प्रमाणात असे काम सुरू आहे. सध्या एखाद्या सोसायटी करिता किंवा छोट्या संख्येत असे प्रयोग सुरू आहेत. कागदावर लिहून किंवा फक्त विचार करण्यापेक्षा प्रत्यक्षात करून बघावा, म्हणजे नेमके, काय प्रश्न, शंका, उद्भवतात हे कळेल. संकल्पनेची माहिती लोकांपर्यंत पोहचेल. काही उत्साही लोक, संस्था मदतीचा हात पुढे करतील. संकल्पनेला भक्कम आकार देण्यासाठी नियम, सुरक्षा, बॅंकेचे व्यवस्थापन सुरळीत चालण्यासाठी नियमावली, रजीस्ट्रेशन, पैशाचे व्यवस्था, वगैरे अनेक गोष्टींचा विचार विमर्श हौईल. असा हा TIME BANK चां concept आहे. असे काम करायला प्रोपर फुल प्रूफ सिस्टीम असायला हवी. एकदा का प्रचलनात आली की तेही होईल. •••

ही सोय फक्त ज्येष्ठांसाठींच आहे असं नाही. कोणीही यांचा लाभ घेऊ शकतो फक्त त्याकरिता त्यांच्या अकाउंट मध्ये वेळेचा बॅलेंस असायला हवा तरच याची सुविधा तुम्हाला मिळेल. ••• 

आज आपल्या घरी सौ् माणिक मावशी आल्या, कारण बाबांचा टाईम बॅंक बेॅलेंस भरपूर आहे. बाबा जोशी काकांकडे रोज संध्याकाळी जायचे, तेंव्हा तो वेळ आनंद बॅंकेत जमा करत असे. •••

त्यामुळे आज आपल्याला माणिक मावशींची मदत होत आहे. आता हा आईसाठी दिलेला वेळ माणिक ताईंच्या अकाउंट मध्ये जमा होईल. •••

अशी ही सायकल चालू राहिल 

स्वीझरलॅंड साऊथ अफ्रिका, इजराईल सारख्या अनेक देशांत ही व्यवस्था छान चालू आहे. •••

तशी व्यवस्था चांगलीच आहे, गरजेची पण आहे. आता आपल्या देशात एकदा का ही व्यवस्था प्रचलनात आली तर चांगले होईल. •••

मला आनंद व त्यांच्या सारख्या शिकलेल्या मुलांचे कौतुक वाटते की त्यांनी आपली नोकरी सांभाळून या प्रकारची सेवा समाजात उपलब्ध करण्याचे ठरविले आहे.

आज आपल्यालाही त्याचा उपयोग झालाच. ••••

भाऊजी म्हणाले, •••

अरे!! पण मी काही मनोहर कडे या उद्देशाने जात नव्हतो. माझा वेळही त्याच्या बरोबर चांगला जात होता. माझी अशी काहीच अपेक्षा नाही. •••

अजय म्हणाला, ••• बाबा!! बरोबर आहे तुमचे म्हणणे. आनंद ने पण तुमच्या वेळेचा/ मदतीचा मान ठेवला. ••••

आज सर्व वेगळ्याच विश्वात होते. भाऊजी म्हणाले, •••

खरंच या तरूण मुलांचे किती कौतुक करावे कळतच नाही. खरंच ही संकल्पना छान आहे. सर्वांनाच कधी न कधी मदतीची गरज पडतेच. •••

मदत आपणही करावी आणि निःसंकोचपणे घ्यावी. •••

योग्य उद्दिष्ट ठेवून योग्य दिशेने सतत प्रयत्न केल्यास आव्हानात्मक परिस्थितीवर सहज विजय मिळवू शकतो. •••

खरंच, ते दिवस छान होते, घड्याळ एखादयाकडेच असायचे, पण वेळ सर्वांकडे.

आता घड्याळ सर्वांकडेच आहे परंतु वेळ कोणाकडेच नाही. •••

आज या गोष्टीचा खेद आहे. ••••

गरजेच्या वेळेस कोणी भरवशाची व्यक्ती माझ्या मदतीला येईल, हा विचार खूप मानसिक आधार देणारा आहे. त्याकरिता आधी •••

“वेळ द्या, नंतर वेळ घ्या. “••••

म्हणतात ना, ••••

रिश्तों को वक्त दो । प्यार भी रहेगा और साथ भी ।•• 

© सुश्री संध्या बेडेकर 

वारजे, पुणे.  

7507340231

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी जडणघडण… भाग – ७६ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ माझी जडणघडण… – भाग – ७६ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(सौजन्य : न्यूज स्टोरी टुडे, संपर्क : ९८६९४८४८००)

बाली

एकदा माझ्या एका अत्यंत अरसिक नातेवाईकाने प्रश्न विचारला होता, “दरवर्षी तुम्ही इतके फिरत असता, सात आठ दिवसांसाठी इतका पैसा खर्च करता, कशासाठी? त्यातून काय मिळतं तुम्हाला? हे निरर्थक वाटत नाही का तुम्हाला? मी तर याला उधळपट्टीच म्हणेन. ”

त्याच्या या प्रश्नाने खरं म्हणजे मी थक्कच झाले होते. शिवाय त्यांनी विचारलेल्या प्रश्नाला जी एक आर्थिक बाजू होती त्यातून त्याला बाहेर काढून कुठल्यातरी अज्ञात, पलीकडच्या आवश्यक भावनिक, मानसिक, विश्वात घेऊन जाणं म्हणजे आपलीच किती दमछाक होईल आणि ऊर्जेचा अपव्यय होईल असा विचार करून मी चक्क गप्पच राहिले. माझ्या मौनाचा अर्थ त्यांनी जो लावला असेल तो असो, मला त्याचा विचार करण्याची गरज भासली नाही.

पण तुमच्याकडे एक रुपया असेल तर अर्ध्या रुपयाची भाकरी खा आणि अर्ध्या रुपयाची फुले विकत घ्या. भाकरी तुम्हाला जगवेल आणि फुलं तुम्हाला जगणं शिकवतील. माझ्या आयुष्याची ही एक मार्गदर्शक रेखा आहे म्हणून प्रवास करणे म्हणजे पैशाची उधळपट्टी करणे असे मला कधीच वाटलं नाही कारण निरनिराळ्या ठिकाणची भ्रमंती म्हणजे एक विशाल असे प्रकटीकरण(एक्सपोजर) असते. जडणघडणीचे एक सक्षम आणि भक्कम माध्यम असते. प्रवासात येणारे भले बुरे अनुभव, होणारी विविध व्यक्तींशी ओळख, अडचणी, संकटे तुम्हाला तुमच्या आयुष्यात कुठल्याही परिस्थितीत न डगमगता कसं स्थिर राहावं याचं प्रात्यक्षिक देणारं ठरतं. प्रत्येक भ्रमंतीत असे विविध अनुभव येतातच असाच आणखी एक कसोटीचा क्षण ठरावा असा भयप्रद अनुभव आम्ही दोन-तीन वर्षांपूर्वी इंडोनेशिया देशातल्या “बाली” या बेटावर गेलो असताना घडला. त्याच बाली सफरीतले काही वेचक क्षण. ही सफर आम्ही साधना, सतीश, सुमन, प्रमोद याआमच्या जीवलग मित्रमैत्रिणींसोबत केली होती.

फायर डान्स —अग्नि नृत्य म्हणजे बाली बेटावरचे एक प्रमुख आकर्षण.

समुद्रकिनाऱ्यावर उतरत्या संध्याकाळी या नृत्याचे भव्य सादरीकरण असतं. बीचवर जाण्याच्या सुरुवात स्थानापर्यंत आम्हाला हॉटेलच्या शट्ल सर्विस ने सोडले. उंच टेकडीवरून आम्हाला समुद्राचे भव्य दर्शन होत होते. ज्या किनाऱ्यावर हे अग्नी नृत्य होणार होते तिथपर्यंत पोहोचाण्याचा रस्ता बराच लांबचा, डोंगरावरून चढउताराचा, पायऱ्या पायऱ्यांचा होता. सुरुवातीला कल्पना आली नाही पण जसजसे पुढे जात राहिलो तसतसे जाणवले की हे फारच अवघड काम आहे. त्यापेक्षा आपण खालून किनाऱ्यावरून चालत का नाही गेलो? तो रस्ता जवळचा असतानाही— असा प्रश्न पडला. अर्थात त्याचे उत्तर यथावकाश आम्हाला मिळालेच. ती कहाणी मी तुम्हाला नंतर सांगेनच. तूर्तास आम्ही धापा टाकत जिथे नृत्य होणार होते तिथे पोहोचलो.

बरोबर संध्याकाळी सहा वाजता हे अग्नी नृत्य सुरू झाले. चित्र विचित्र, रंगी बेरंगी, चमचमणारी वस्त्रं ल्यायलेले, अर्धे अधिक उघडेच असलेले नर्तक आणि नर्तिकांनी हातात पेटते पलीते असलेली चक्रे फिरवून नृत्याला सुरुवात केली. समोर सादर होत असलेल्या त्या नृत्य क्रीडा, पदन्यास आणि ज्वालांशी लीलया चाललेले खेळ खरोखरच सुंदर तितकेच चित्तथरारक होते. आपल्याकडच्या गोंधळ, जागर यासारखाच लोकनृत्याचा तो एक प्रकार होता. संगीताला ठेका होता. अनेक आदिवासी नृत्यंपैकी हे एक नृत्य. साहस आणि कला यांचं अद्भुत मिश्रण होतं.

लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया

झळाळती कोटी ज्योती या….

या जुन्या गाण्याचीही आठवण झाली.

काळोखात चाललेलं आभाळ, लाटांची गाज, मऊ शुभ्र वाळू यांच्या सानिध्यात चाललेलं ते अग्नी प्रकाशाचे नृत्य फारच प्रेक्षणीय होतं. उगाच काहीसं भीषण आणि गूढही वाटत होतं. एक तास कसा उलटला ते कळलंही नाही.

परतताना मात्र आम्ही आल्यावाटेने गड चढत जाण्यापेक्षा सरळ वाळूतून चालत जायचे ठरवले. तिथल्या स्थानिक माणसाने आम्हाला एवढेच सांगितले, ” अर्ध्या तासात समुद्राला भरती येईल. मात्र दहा ते पंधरा मिनिटात तुम्ही शटल पॉईंट ला पोहोचालच. जा पण सांभाळून.. ” 

मग असे आम्ही सहा वृद्ध वाळूतून चालत निघालो. वाळूतून चालणारे फक्त आम्हीच असू. बाकी सारे मात्र ज्या वाटेने आले त्याच वाटेने जाऊ लागले.

हळूहळू लक्षात आले वाळूच्या अनंत थरातून चालणे सोपे नव्हते. पाय वाळूत रुतत होते. रुतणारे पाय काढून पुढची पावले टाकण्यात भरपूर शक्ती खर्च होत होती. अंधार वाढत होता. समुद्र पुढे पुढे सरकत होता. आमच्या सहा पैकी सारेच मागे पुढे झाले होते. समुद्राच्या भरतीची वेळ येऊन ठेपत होती.

 विलासला फूट ड्रॉप असल्यामुळे तो अजिबात चालूच शकत नव्हता. आम्ही दोघं खूपच मागे राहिलो. मी विलासला हिम्मत देत होते. थोड्या वरच्या भागात येण्याचा प्रयत्न करत होतो पण विलास एकही पाऊल उचलूच शकत नव्हता आणि तो वाळूत चक्क कोसळला. त्या विस्तीर्ण समुद्राच्या वाळूत, दाटलेल्या अंधारात आम्ही फक्त दोघेजण! आसपास कुणीही नाही. दोघांनाही आता जलसमाधी घ्यावी लागणार हेच भविष्य दिसत होतं. मी हाका मारत होते…” साधना, सतीश प्रमोद हेल्प हेल्प”

मी वाळूत उभी आणि विलास त्या थंडगार वाळूत त्राण हरवल्यासारखा निपचीत पडून. एक भावना चाटून गेली.

We have failed” आपण उंट नव्हतो ना…

कुठून तरी साधना धडपडत कशीबशी आमच्याजवळ आली मात्र. सतीश ने माझी हाक ऐकली होती. समोरच बीच हाऊस मधून त्यांनी काही माणसांना आमच्यापर्यंत जाण्यास विनंती केली.. दहा-बारा माणसं धावत आमच्या जवळ आली. सतीशच्या प्रसंगावधानाचे कौतुक वाटले. कारण त्याने त्याच क्षणी जाणले होते की हे एक दोघांचं काम नव्हे. मदत लागणार. मग त्या माणसांनी कसेबसे विलासला उभे केले आणि ओढत उंचावरच्या पायऱ्या पर्यंत आणले. तिथून एका स्विमिंग बेड असलेल्या खुर्चीवर विलासला झोपवून पालखीत घालून आणल्यासारखे शटल पॉईंट पर्यंत नेले. हुश्श!! आता मात्र आम्ही सुरक्षित होतो. चढत जाणाऱ्या समुद्राला वंदन केले. त्याने त्याचा प्रवाह धरुन ठेवला होता का? त्या क्षणी ईश्वर नावाची शक्ती अस्तित्वात आहे याची जाणीव झाली. आमच्या मदतीसाठी आलेली माणसं मला देवदूता सारखीच भासली. जगाच्या या अनोळखी टोकावर झालेल्या मानवता दर्शनाने आम्ही सारेच हरखून गेलो. श्रद्धा, भक्ती आणि प्रेम या संमिश्र भावनांच्या प्रवाहात मात्र वाहून गेलो. या प्रसंगाची जेव्हा आठवण येते तेव्हा एकच जाणवते, *देअर इज नो शॉर्टकट इन लाईफ*

बिकट वाट वहिवाट नसावी धोपट मार्ग सोडू नको.. हेच खरे.

शरीराने आणि मनाने खूप थकलो होतो गादीत पडताक्षणीच झोप लागली.

दुसऱ्या दिवशीची सकाळ छान प्रसन्न होती. विलास जरा नाराज होता कारण कालच्या थरारक एपीसोडमध्ये त्याचा मोबाईल मात्र हरवला. पण आदल्या दिवशी ज्या दुर्धर प्रसंगातून आम्ही दैव कृपेने सही सलामत सुटलो होतो, त्या आठवणीतच राहून निराश, भयभीत न होता दुसऱ्या दिवशी आमची टीम पुन्हा ताजीतवानी झाली. सारेच पुढच्या कार्यक्रमाचे बेत आखू लागले.

दुसर्‍या दिवशीच्या सकाळी कर्मा कंदारा— विला नंबर ६७ च्या खाजगी तरण तलावावर जलतरण करण्याचा आनंद मनसोक्त लुटायचा हेच ठरवले.

अवतीभवती हिरव्या गच्चपर्णभाराचे वृक्ष आणि मधून मधून डोकावणारी पिवळ्या चाफ्याची गोजीरवाणी झाडे यांच्या समवेत तरण तलावात पोहतानाचा आनंद अपरंपारच होता.

अनेक वर्षांनी इथे, बालीच्या या नयनरम्य पार्श्वभूमीवर, सुरुवातीला काहीशा खोल पाण्यात झेप घेताना भयही वाटलं. पण नंतर वयातली ३०/४० वर्षं जणू काही आपोआपच वजा झाली आणि पोहण्याचा मनमुराद आनंद लुटू शकलो. झाडं, पाणी आणि सोबतीला आठवणीतल्या कविता.

थोडं हसतो थोडं रुसतो 

प्रत्येक आठवण 

पुन्हा जागून बघतो ।।

अशीच मनोवस्था झाली होती.

सिंधुसम हृदयात ज्यांच्या

रस सगळे आवळले हो

आपत्काली अन् दीनांवर

घन होउनी जे वळले हो

जीवन त्यांना कळले हो..

बा. भ. बोरकरांच्या या कवितेतले ‘जीवन कळणारे’ ते म्हणजे जणू काही आम्हीच होतो हीच भावना उराशी घेऊन आम्ही तरण तलावातून बाहेर आलो.

असे हे बालीच्या सहलीत वेचलेले संध्यापर्वातले खूप आनंदाचे क्षण!!

तसा आजचा दिवस कष्टमय, भटकण्याचा नव्हता. जरा मुक्त, सैल होता.

इथल्या स्थानिक लोकांशी गप्पा करण्यातली एक आगळी वेगळी मौज अनुभवली.

ही गव्हाळ वर्णीय, , नकट्या नाकाची, गोबर्‍या गालांची, मध्यम उंचीची, गुटगुटीत ईंडोनेशीयन माणसं खूप सौजन्यशील, उबदार हसतमुख आणि आतिथ्यशीलही आहेत.

भाषेचा प्रमुख अडसर होता. कुठलीही भारतीय भाषा त्यांना अवगत असण्याचा प्रश्नच नव्हता. पण इंग्रजीही त्यांना फारसं कळत नव्हतं. ते त्यांच्याच भाषेत संवाद साधण्याचा प्रयत्न करत होते. पण गंमत सांगते, भाषेपेक्षाही मुद्राभिनयाने, हातवारे, ओठांच्या हालचालीवरूनही प्रभावी संवाद घडू शकतो याचा एक गमतीदार अनुभवच आम्ही घेतला.

सहज आठवलं, पु. ल. जेव्हा फ्रान्सला गेले होते तेव्हा दुधाच्या मागणीसाठी त्यांनी शेवटचा पर्याय म्हणून कागदावर चक्क एका गाईचे चित्रच काढून दाखवलं होतं. तसाच काहीसा प्रकार आम्ही येथे अनुभवला.

बाली भाषेतले काही शब्द शिकण्याचा खूप प्रयत्न केला पण लक्षात राहिला तो एकच शब्द *सुसु*.

बाली भाषेत दुधाला सुसू म्हणतात.

पण त्यांनीही आपले, ’नमस्कार, शुभ प्रभात, कसके पकडो वगैरे आत्मसात केलेले शब्द, वाक्यं, त्यांच्या पद्धतीच्या उच्चारात बोलून दाखवले. माणसाने माणसाशी जोडण्याचा खरोखरच तो एक भावनिक क्षण होता!

या भाषांच्या देवघेवीत आमचा वेळ अत्यंत मजेत मात्र गेला आणि त्यांच्या प्रयत्नपूर्वक मोडक्या तोडक्या इंग्लिश भाषेद्वारे बाली विषयी काही अधिक माहितीही मिळाली.

राजा केसरीवर्माने या बेटाचे नाव बाली असे ठेवले.

बाली या शब्दाचा अर्थ त्याग.

बाली या शब्दाचे मूळ, संस्कृत भाषेत आहे आणि या शब्दाचा सामर्थ्य, शक्ती हाही एक अर्थ आहे. आणि तो अधिक बरोबर वाटतो.

आणखी एक गमतीदार अर्थ त्यांनी असा सांगितला की बाली म्हणजे बाळ. बालकाच्या सहवासात जसा स्वर्गीय आनंद मिळतो तसेच स्वर्गसुख या बाली बेटावर लाभते.

बाली बेटावरच्या स्वर्ग सुखाची कल्पना मात्र अजिबात अवास्तव नव्हतीा हे मात्र खरं!!

संध्याकाळी कर्मा ग्रुप तर्फे झिंबरान बीच रिसॉर्टवर आम्हाला कॉम्प्लिमेंटरी डिनर होते. जाण्या येण्यासाठी त्यांच्या गाड्या होत्या.

संगीत, जलपान आणि गरमागरम पदार्थांची रेलचेल होती. वातावरणात प्रचंड मुक्तता होती. खाणे पिणे आणि संगीत, सोबत तालबद्ध संगीतावर जमेल तसे केवळ नाचणे. थोडक्यात वातावरणात फक्त आनंद आणि आनंदच होता आणि या आनंदाचे डोही आम्हीही अगदी आनंदे डुंबत होतो. LIVE AND LET LIVE.

बाॅबी मॅक फेरीनच्या गाण्यातली ओळ ओठी आली..

DONT WORRY BE HAPPY

OOH OH OH

– क्रमशः भाग ७६..

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ दोष हा कुणाचा? ☆ श्री मयुरेश उमाकांत डंके ☆

श्री मयुरेश उमाकांत डंके

??

☆ दोष हा कुणाचा? ☆ श्री मयुरेश उमाकांत डंके

एका हाॅटेलमध्ये जेवायला गेलो होतो. शेजारच्या टेबलावर चार मुली बसल्या होत्या. त्यांचं जेवण आटोपलं. वेटर ने बडीशेपचा बाऊल समोर ठेवला. चारही मुलींनी टिश्यू पेपरमध्ये बचकभर बडीशेप भरून घेतली आणि ती पुरचुंडी पर्समध्ये टाकली. आजूबाजूच्या १०० माणसांमध्ये असूनही आणि चांगल्या कुटुंबातल्या असूनही असं करताना त्यांना काहीही वाटलं नाही.

अनेक काॅलेजवयीन विद्यार्थी-विद्यार्थिनींना मी हाॅटेल्समधून चमचे चोरतानाही पाहिलं आहे. विमानातून प्रवास करताना काही मंडळी अक्षरश: ओंजळी भरभरून चाॅकलेट्स किंवा टाॅफीज् घेतात. काही रेल्वे प्रवासात पाण्याच्या बाटल्या प्रवाशांना दिल्या जातात. अनेकजण दोन-दोन किंवा तीन-तीन बाटल्या सुद्धा घेतात. रेल्वे प्रवासात (केवळ त्या प्रवासापुरतेच मिळणारे) टर्किश नॅपकिन्स सर्रास बॅगेत भरतात. साॅस किंवा साखरेची ट्रॅव्हलिंग पाऊचेस न विचारता उचलणे, टीबॅग्ज उचलणे, टिश्यू पेपर्सचा गठ्ठाच उचलणे हे प्रकार माणसं अगदी बिनधास्त करतात.

एकदा एका ट्रेक ला गेलो होतो आणि एका रिसाॅर्टवर राहिलो. तिथं आलेल्या एकानं शॅम्पूचे सॅशे आणि साबणाच्या छोट्या वड्यांचा बाॅक्सच उचलून नेला. एका सुशिक्षित, जाणत्या बाईंनी लाॅबीमध्ये सहज म्हणून वाचण्याकरिता ठेवलेली दोन मॅगेझिन्स उचलली आणि पर्समध्ये घातली. हा प्रकार आजूबाजूची माणसं, हाॅटेल व्यवस्थापनातले कर्मचारी पाहत होते. पण कुणी काही विरोध केला नाही.

घराजवळच्या हाॅट चिप्स च्या दुकानात गेलो होतो. दोन मुली आल्या. त्यांनी सात-आठ प्रकारचे वेफर्स टेस्ट करून पाहिले आणि काहीही खरेदी न करता निघून गेल्या. दुकानाचा मालक म्हणाला, “ऐसे तो बहोत लोग आतें हैं, सब के सब पढें-लिखे और अच्छे घर के ही होतें हैं । पता नहीं, ऐसा क्यूॅं करतें हैं? ” 

रस्त्यावरच्या एखाद्या फळविक्रेत्याकडे गेलात आणि फळं खरेदी करायची असतील तर एखादं फळ चवीपुरतं चाखायला देतो. काहीजण स्वत:च हात पुढं करून सात-आठ फळं तर उभ्या-उभ्या सहजच मटकावतात. चणे विक्रेते किंवा चुरमुऱ्यांची भट्टी चालवणाऱ्यांना तर हा अनुभव दररोज शंभरदा येत असेल. माणसं अगदी स्वत:चा हक्क असल्यासारखा हात घालतात.

मंडईत गेलो होतो. कैऱ्या विकणाऱ्या एका वयस्कर विक्रेतीसमोर एक काकू उभ्या राहिल्या. विक्रेतीनं भाव सांगितला आणि कैरीची एक फोड कापून त्यांच्या हातावर ठेवली. कैरीची फोड खात-खात काकू एक अक्षरही न बोलता निघून गेल्या. आम्ही दोघेही शेजारीच उभे होतो. तो प्रसंग पाहून आम्हालाच कसंतरी झालं.

चांगली शिकली-सवरलेली माणसं अशी का वागत असतील? आपण परदेशातल्या लोकांकडून त्यांची भाषा, राहणीमान, कपडे, फॅशन्स हे सगळं घेतलं, पण सार्वजनिक आयुष्यात ती माणसं किती संतुलितपणे वागतात, हे आपण नाही स्वीकारत..!

कॅरीबॅगसाठी दुकानदारांशी हुज्जत घालणारी सुशिक्षित जनता मी पाहतो, तेव्हा मला त्यांच्या सुशिक्षितपणाचाच अर्थ लागत नाही. नुसतंच बाह्यरूप पाॅश करून आपण सुशिक्षित असल्याचा आभास निर्माण करत राहण्याच्याच कृत्रिम देखाव्याच्या चक्रात माणसं अडकली आहेत का?

हा बिनबुडाचा सुशिक्षितपणा केवळ अशा चोऱ्या-माऱ्या आणि उचलाउचलीचे उद्योग करून थांबत नाही. उघडपणे सामाजिक नियम मोडण्यातही हा वर्ग आघाडीवर आहे.

पेट्रोलपंपावर मोबाईल फोनवर गप्पा मारणे, एटीएम सेंटरमध्ये गाॅगल्स, स्कार्फ किंवा टोपी घालून जाणे, सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर खुशाल धूम्रपान करणे, सार्वजनिक ठिकाणी भर रस्त्यात बिनदिक्कतपणे थुंकणे, या गोष्टी करून माणसं नक्की काय दाखवण्याचा प्रयत्न करत असतात?

नामवंत काॅलेजेसमध्ये शिकणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी पार्किंग आणि नो पार्किंगमधला फरकही ओळखू शकत नाहीत का? सुशिक्षित माणसं मुद्दामच झेब्रा क्राॅसिंगवरच गाडी का थांबवतात? शिकली-सवरलेली माणसं बसस्टाॅप सोडून भर रस्त्यावर गर्दी करून बसची वाट का पाहतात? खिशात पैसे असूनही बस कंडक्टर ला फसवून विनातिकीट प्रवास का करतात?

लक्ष्मी रस्ता हा जसा बाजारपेठेचा रस्ता आहे तसं ते माणसांच्या अतरंगीपणाची लक्षणं पाहण्याचंही एक ठिकाण आहे. माणसं रस्त्यातच आपली भलीमोठी चारचाकी गाडी थांबवून दुकानासमोर उतरतात आणि ड्रायव्हर ती गाडी रस्त्यातच उभी करून, काचा वर करून, आतमध्ये एसी लावून बसलेला असतो. बाकीची वाहतूक कोलमडून जाऊन याच्या नावानं शंख करत असते, पण हा एकदम कूल..!

माणसं कुल्फी घेतील आणि काड्या रस्त्यावरच टाकतील. मक्याचं कणीस घेतील, उरलेला भाग रस्त्यावरच टाकतील. प्लास्टिकच्या ग्लासात काॅर्नभेळ घेतील, रिकामा ग्लास रस्त्यावरच टाकून मोकळे.. याच रस्त्यावर मोबाईल फोनवर बोलत रस्ता क्राॅस करणारे अनेकजण दिसतील. नो एण्ट्री तून वाहने चालवणारे अनेकजण दिसतील. ही सगळी मंडळी लौकिकार्थानं किमान ग्रॅज्युएट तरी निश्चित असतात. पण, सार्वजनिक ठिकाणी कसं वागावं आणि कसं वागू नये, असा कुठला पेपर त्यांच्या कोर्समध्ये नसतो, त्यामुळे त्या विषयाचा त्यांना गंध नसतो. त्यामुळे, सार्वजनिक जीवनात सगळे नापास!

अनेक ठिकाणी खाऊगल्ल्या आहेत, तिथले खाद्यपदार्थ विक्रेते संध्याकाळी व्यवसाय संपला की, सांडपाणी थेट रस्त्यावर टाकून देतात. त्यामुळे तो रस्ता अस्वच्छ, चिकट होतो, माशा घोंगावतात. पण सार्वजनिक ठिकाणचं त्यांचं हे वागणं आपण कुणीही मनावर घेत नाही.

 भर रात्री बारा वाजता झोपलेल्या जगाला जागं करून वाढदिवस साजरा करणारा एक नवीन वर्ग तयार झाला आहे. ही मंडळीसुद्धा सुशिक्षित असतात. अनेकदा काॅलेजात शिकत असतात. पण, भर रात्री केकच्या दुकानाबाहेरच टोळकं जमवून ज्याचा वाढदिवस आहे अशा उत्सवमूर्तीच्या तोंडाला, डोक्याला येथेच्छ केक फासून, त्याला दारू पाजून लाथाबुक्क्यांनी बदडून काढणे, त्याच्या डोक्यात अंडी फोडणे असे प्रकार करतात. हे सगळं चांगलं वागणं आहे का? आणि एकविसाव्या शतकातल्या समाजाला हे शोभतं का?

ही मंडळी असं का वागतात, याला काहीही उत्तर नसतं. अशी कितीतरी लोकोत्तर व्यक्तिमत्त्वं आपल्याला ठायीठायी दिसतील. ही माणसं उघडपणे चोऱ्या करतात, गरिबांना नाडतात, त्यांना त्रास देतात, स्वत:च्या वागणुकीनं इतरांचं सार्वजनिक आयुष्यही पार खराब करून टाकतात. आपण यावर कधी आक्षेप घेतला आहे का? लोकांना दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसेल पण स्वत:च्या ताटातलं मुसळ दिसणार नाही.

गाय दूध देते तेव्हा ते चांगलंच असतं. पण, आपण ते नीट तापवलं नाही तर ते नासणारच. म्हणून, मग आपण गायीला दोष देणार का? तांब्याच्या भांड्यात ठेवलेलं दही कळकलं तर दोष दह्याचा नसतो आणि भांड्याचाही नसतो, दोष दही तांब्याच्या भांड्यात ठेवणाऱ्याचा असतो.

आपण नेहमी प्रशासनाकडे, सरकारकडेच बोटं दाखवत राहू, आरोप करत राहू. सरकारकडून आपल्या अपेक्षा फार मोठ्या असतात, पण साध्या साध्या गोष्टी जपण्यातही आपण स्वत: कमी पडतो. स्वत:ला पारखलं आणि स्वत:च्या वागण्यातले दोष दूर करायचं ठरवलं तर प्रगतीला सुरूवात होईल.. सगळं मळभ जाऊन आभाळ स्वच्छ होईल..!

समाजाने स्वत: पुढाकार घेऊन या साध्या साध्या गोष्टी सुधारल्या तरी ‘अच्छे दिन’ नक्कीच येतील…!

©️ श्री मयुरेश उमाकांत डंके

मानसतज्ज्ञ, संचालक-प्रमुख, आस्था काऊन्सेलिंग सेंटर, पुणे.

 8905199711, 87697 33771

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “… आणि लोणचे ग्लॅमरस झाले…” ☆ सुश्री शीला पतकी ☆

सुश्री शीला पतकी 

? मनमंजुषेतून ?

☆ “… आणि लोणचे ग्लॅमरस झाले…” ☆ सुश्री शीला पतकी 

आपल्या मराठी भाषेत विशेषणाची अगदी रेलचेल आहे. रंग असेल तर लाल भडक, पिवळा धमक, पदार्थ असेल तर खमंग ढोकळा, खुसखुशीत चकली, चमचमीत भेळ वगैरे, यांनी काय बरे होते. उदा. भेळ म्हंटल्यावर नॉर्मल चिरमुऱ्यांची भेळ. चमचमीत भेळ म्हटले कागदात वरपर्यंत ढीग लावलेली वरून बारीक शेव त्यावर मिरची कैरीची फोड हे चित्र उभे करण्याची ताकद या विशेषणांमध्ये असते. पण काही शब्द हे स्वयंभू असावेत विशेषणांशिवाय परिणाम साधतात. लोणचे हे त्यापैकीच एक. लोणचे शब्द उच्चारला की तोंडाला पाणी सुटते. वेगळे विशेषण लावायची त्याला गरज नसते. तसे आंबट, गोड खारट, तिखट अशा सगळ्या चवीचे मिश्रण असले तरी त्यातली प्रत्येक चव स्वतंत्र अनुभवता येते. खरे तर या चवी लोणच्यात प्रमाणापेक्षा थोड्या जास्तच वापरल्या जातात. पण एकत्र मुरल्यावर त्या जी काय चव धारण करतात त्याला तोड नाही.

वर्षभर टिकणारे कैरी, लिंबू, आवळा, माईंमुळं, करवंद, मिरची, बाळ कैरीचे लोणचे.

तात्पुरते भाज्यांचे लोणचे. उत्तरेकडे मोहरीच्या तेलातील लोणची, दक्षिणेकडील वेगळ्या मसाल्यातील लोणची असे अगणित प्रकार आपल्या भारतात पहायला मिळतील.

पानात मिठाच्या खालोखाल डाव्या बाजूला विराजमान होणारे लोणचे, चटणी आणि कोशिंबीर.

पण लोणच्यामुळे पान देखणे दिसायला लागते. वाढायला सुरुवात केल्यावर चटणी किंवा कोशिंबीर कोणी चाखून बघत नाहीत. तो मान लोणच्याचा. लोणचे बोटावर घेऊन चाखल्याशिवाय राहवत नाही.

लोणचे काय करते तर, सगळ्या चवी आपल्या मुखात स्त्रावयला लागतात आणि आपली जेवणाची इच्छा वाढवतात. हे झाले शास्त्र.

पण लौकिक अर्थी काय काय करते बघूया

एखादी भाजी चांगली झाली नसेल, तर बायकोला न दुखवता नवऱ्याच्या मदतीला धाऊन जाते.

मुलांच्या आवडीची भाजी नसेल तर उपयोगी येते. अचानक पाहुणे आले तर भाजी सोबत पुरवठा म्हणून येते.

शेजाऱ्यांची वाटी आली असेत तर त्यात काय घालून द्यायचे तर लोणचे.

शिवाय पराठे, धपाटे, थालीपीठ, मुगाची खिचडी यां पदार्थांची रंगत लोणच्याशिवाय नाही, की लग्नाची पंगत ही नाही.

संध्याकाळी बरणीतून काढायचे नाही, तिन्ही सांजेला कुणाला देऊ नये, माहेरवाशिणीना लोणचे देऊ नये अशाही काही याच्या मान्यता आहेत.

भात, भाकरी खाऊन पोटाची भूक भागते पण जिभेची तृप्तता करण्याचे सामर्थ्य लोणच्यातच.

असे हे लोणचे इतके वर्ष घरगुती विषय होता. पण मध्यंतरी आपल्या फायनान्स मिनिस्टर निर्मला सीतारामनजी यांचा लोणचे घालतानाचा एक व्हिडिओ वायरल झाला. तोही छान भारतीय बैठकीत अगदी घरगुती साध्या कपड्यात. अगदी आपण घरी असतो तशा.

.. त्या व्हिडिओ मध्ये त्यांचा साधेपणा दिसत होताच – – पण त्याचसोबत – – 

… एरवी घरात बरण्यामध्ये साठवलेले, गरजेपुरते बाहेर काढले जाणारे साधे लोणचे मात्र त्यादिवशी ग्लॅमरस झाले…

© सुश्री शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका, सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares