सुश्री शीला पतकी
मनमंजुषेतून
☆ “प्रेमपत्र…” ☆ सुश्री शीला पतकी ☆
☆
प्रेमपत्र – – –
पुणे येथील ‘ गाणे मनामनांचे ‘ या संस्थेकडून आजी आजोबांसाठी प्रेमपत्र स्पर्धा आयोजित करण्यात आली होती त्यामधून पाच सर्वोत्तम पत्राची निवड केली जाणार होती. या स्पर्धेत भाग घेण्यासाठी माझ्या एका मैत्रिणी च्या भाच्याने मला आग्रह केला आणि माहिती पाठवली. मग मी या स्पर्धेसंबंधी विचार करायला लागले…. प्रेम पत्र तर आजपर्यंत कोणाला लिहिले नाही… त्याचा विचारही केला नाही… विषय अवघड… लेखणी थांबली…! आता काही अनुभवी लोकांचा सल्ला घ्यावा म्हणून एका गटातील मैत्रीणीला फोन केला… ती म्हणाली, “नाही हो शीला ताई असलं काय नसतंय बघा मी तर कधी लिहिलं नाही” आता अनुभवी लोकांकडून पहिला नकार आला. माझ्या एका मैत्रिणीला… तिचा प्रेम विवाह होता…. तिला विचारलं…. एकाच गावात असल्यामुळे आम्ही कधी पत्र लिहिले नाही… तिने उत्तर दिले. विषय असा होता की ज्याच्यावर तुमचे प्रेम आहे अशा कुणालाही तुम्ही पत्र लिहा भावाला बहिणीला आईला देशाला मैत्रिणीला.. प्रेम पत्र म्हणले की प्रेम पत्र हे प्रियकरालाच लिहिले पाहिजे अशी माझी तरी धारणा…. मग मी विचार करून प्रेम पत्र लिहिण्याचा निर्णय घेतला… कलावंताला जशा सगळ्या भूमिका निभावता आल्या पाहिजेत तशा लेखकाला कोणत्याही विषयावर लिहिता आले पाहिजे. असे मनाला बजावले आणि प्रेम पत्र लिहायला सुरुवात केली जरा संकोच वाटत होता. ज्याचा कधी तरुण वयात विचार केला नाही ते आता म्हातारपणी विचार करायची वेळ आली…. पण शेवटी स्पर्धा होती त्यातून पाच सर्वोत्तम पत्राची निवड केली जाणार होती..! पारितोषिक हा भाग आता महत्त्वाचा राहिला नाही आता एक्सेप्ट द चॅलेंज हा भाग महत्त्वाचा आहे, किंबहुना आता या विषयापुरता तरी तो वाटला आणि मग लिहायला बसले. पत्रलेखन पूर्ण झाल्यावर अनुभवी माणसांचा थोडा सल्ला घेतला… बरे झाले आहे का? असे विचारले.. काही चुकत तर नाही ना याबद्दल खात्री केली आणि ते स्पर्धेला धाडले……… आणि मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की पाच सर्वोत्तम पत्रामध्ये माझ्या पत्राची निवड झाली असा एक मेसेजही फेसबुक वर आला मला आनंद यासाठी झाला की अनुभवातून लिहिणारी मी किंवा अनुभवामुळे लेखन करणारी मी पण या विषयात मात्र प्रचंड कल्पनाशक्तीचा वापर करून मी हे लेखन केले आहे आपल्या ग्रुप वर ते पत्र टाकते आहे वाचा आनंद घ्या त्रुटी असतील तर कळवा म्हणजे पुढे काही स्पर्धा असतील तर सुधारणा करता येतील माझ्या लेखनाला आपले सर्वांचे प्रोत्साहन नेहमीच लाभले आहे त्यातूनच ही प्रगती….!
धन्यवाद! – ते पुरस्कारप्राप्त पत्र असे – – –
प्रिय वसुधा,
लग्नाला 40 वर्षे झाली पण तुला प्रेम पत्र काय साध कार्डही लिहणे जमलं नाही. वसु आपल्यामध्ये व्यक्त होण्याची पद्धतच नाही पण आज मात्र मी ठरवलंय माझ्या मनातलं सगळं तुला सांगायचं… ऐकतेस ना..?
वसु मी पहिल्यांदा तुला पाहायला आलो ना माझ्यासमोर एक वीस वर्षाची लांब सडक केसांची किंचित सावळी टपोऱ्या डोळ्यांची एक गोड मुलगी हातात ट्रे घेऊन आली.. खरं सांगू मी त्याच वेळेला खलास…. मनाने ताबडतोब सांगितलं… “अरे हीच माझी वहिदा” मन गुणगुणायला लागलं… चौधविका चांद हो या आफताब हो.. हृदयात वाजे समथिंग… डोक्यात घंटा वाजायला लागल्या.. मंजुळ सुरेख… माझी पसंती तेव्हाच झाली.
माझ्या तीन खोल्यांच्या घरात निशिकांतची बायको म्हणून तू प्रवेश केलास.. घरात कसला प्रत्येकाच्या मनात प्रवेश केलास. तीन खोल्याचं छोटसं घर सगळं तू आपलं केलं. आईच्या मार्गदर्शनाखाली तू सगळं उत्तम निभावून नेलं. वसु त्या तीन खोल्यात आपल्याला म्हणावा तसा एकांत मिळत नव्हता. मग काय नजरेचे खेळ! जेवायला बसल्यावर मी चटणीचे बोट जिभेवर ठेवून टक् टक् करायचं आणि ओठावर बोट ठेवायचं आई ओरडायची… काय रे आवाज करत जेवतोस… पण तो आपला एक वेगळाच इशारा होता. तू पटकन तोंड लपवून पाठमोरी होऊन हसायचीस. आणि हातावर सुपारी ठेवताना हळूच चिमटा काढायची… मी आई गss असं ओरडायचं.. आई म्हणायची काय रे…? काही नाही ऑफिसला चाललोय… किती रोमँटिक दिवस होते ना!
ऑफिसातून येताना मी तुझ्यासाठी गजरा आणायचो ते कोणाला कळू नये म्हणून देवासाठी मोगरा असलेली फुलपुडी आणायची. मग ते आठ बाय आठच्या खोलीत… खोलीभर तो मोगरा दरवळायचा मग काय…
मी मोगरा माळवतो तुला.. आणि शब्द ओठात घोळतो
शब्द रेंगाळतो जिभेवर.. मौन संवाद साधतो //
प्रेमाचा संवादच आगळा.. देह सारा बोलतो..
शब्दांचे मुके पण तिथे जरी.. भाव संवाद साधतो//
अशी मुक्या संवादाची सुरुवात व्हायची शब्दाच्याही पलीकडची भाषा समजण्याचे आपले प्रेम.. कधी बोलावच लागलं नाही. पण या मोगऱ्या पलीकडे मी तुझी कोणतीच हौस करू शकलो नाही ना?
वसु पण खरं सांगतो माझ्या आयुष्यात तू आलीसआणि तू माझी प्रेरणा झालीस कुणासाठीकाही करून दाखवावं अशी तू एकटी होतीस तुझ्यामुळे माझा आत्मविश्वास दुणावला पुढे पुढे जात राहिलो आणि मागे तू धावत राहिलीस बिनतक्रार.!
गाण्यातली विशारद तू गाण्याचे क्लास घरी घेताना तुझा रियाज व्हायचं तेवढाच खूप वाटायचा तुझ्या मांडीवर डोकं ठेवून झोपाव तू एखादी सुंदर चीज माझ्यासाठी गात रहावी पण असं आपल्याला हे जमलं नाही ना. कधी चार माणसाच्या घरात असं प्रेम करता येत नाही म्हणतात, खरं आहे ते! मी तुला काही देऊ शकलो नाही पण प्रेम मात्र भरभरून दिल. जागेचा अभाव आणि माणसांची रेलचेल असलेले छोट्या घरात आपले प्रेम मात्र अभावातल्या ऐश्वर्या सारखे वर्धिष्णू झाले मग त्या प्रेमात थोडी असूया आलीच… तुझा मामेभाऊ सुभाष जेव्हा आला आणि तुझ्याशी सुधी सुधी म्हणून बोलायला लागला तेव्हा माझा संताप झाला होता, पण एक दिवसासाठी आला म्हणून गप्प बसलो. तुला आठवतंय त्यावेळेला माझा राजकपूर झाला होता. मी एक गाणं गुणगुणत होतो.. तूम अगर मुझको ना चाहो तो कोई बात नही तुम किसी गैर को चाहोगी तो मुश्किल होगी…. तो पोपट्या तुझा भाऊ असल्यामुळे तुझा हात धर धरून बसवत होता आणि बोलत होता.. सुधी असं सुधी तसं माझा जरा तोल गेलाच. मी म्हणलं.. “अरे वसुधा नाव आहे तिचं “तो म्हणाला, “चालते हो भाऊजी मी हिला नेहमीच सुधी म्हणायचो” तो गेला तेव्हा मी खूप रागावलो होतो तुझ्यावर आणि तू हसत होतीस. म्हणालीस, ” आज काहीतरी जळलं बाई घरात “तो रुसवा फुगवा दोन दिवस चालला होता आणि मग तू माझ्यासाठी खास विणलेला स्वेटर मला सरप्राईज भेट दिलास त्या स्वेटर पेक्षा तुझ्या प्रेमाची उब होती. प्रेमात मी पुन्हा एकदा न्हाऊन निघालो… सगळा रुसवा गळून गेला फक्त उब शिल्लक. वसु तु मला एक नाव ठेवलं होतं फक्त आपण दोघं असतानाच तू मला हाक मारायची… *निक* निशिकांतचा निक झालो…! आपण पुढे आपल्या मुलांच्या जबाबदाऱ्या आईच आजारपण यात सगळं हरवून गेलो नाही? मग तू मला बाबा म्हणायला लागलीस कारण आता मुलांचा बाबा झालो होतो ना मी…! दिवस भराभर सरले केसातली चांदी गडद झाली. वसु तुला आठवतं आई गेली त्या रात्री मी पार कोलमडलो होतो तिचं सगळं झाल्यानंतर मी एके रात्री तुझ्या मांडीवर डोकं ठेवून हमसून हमसून रडलो होतो तेव्हा तू माझी पत्नी नव्हतीस तर आई झाली होतीस तेव्हा हे वाक्य मला जास्त पटलं की” स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंत कालची माता असते”… अगं किती भूमिका निभवल्यास बायको आई बहीण आणि छान मैत्रीण पण मी मात्र तुला प्रेमाचे दोन शब्द काही मोकळेपणाने बोलू शकलो नव्हतो… पण तुला माझ्या डोळ्यात, स्पर्शात हे बहुदा दिसत असावं म्हणूनच इतक्या समाधानांन माझा संसार मार्गी लावलास… आता तुझे चांदण्याचे हात सखे माझ्या गळा हे असेच निरंतर ठेवशील ना? आता आपण दोघेच… अभी ना जाओ छोडके के दिल अभी भरा नही… आता एकमेकांपासून दूर होणे नाही आता देवानंद नाही आता फक्त तुझा निकी आता इतकंच खरं आहे की हमे तुमसे प्यार कितना हम नही जानते मगर जी नही सकते तुम्हारी बिना हेच खर. खरं तर आपलं प्रेम शब्दात मांडण्याच्या पलीकडे पण जमतील तेवढे शब्द जमवून लिहिले आहेत. वसु खाली माझ्या ओठाचा एक ठसा उमटवलाय त्याच्यावर तुझे ओठ टेकव उरलेलं सगळं माझ्या मनातला आपोआप तुझ्या हृदयात उतरेल करशील ना एवढं….?
तुझाच निकी उर्फ निशिकांत उर्फ अहो ss
☆
© सुश्री शीला पतकी
माजी मुख्याध्यापिका, सेवासदन प्रशाला सोलापूर
मो 8805850279
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈













