मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ स्वागत सोलापुरी… ☆ शीला पतकी ☆

शीला पतकी 

? मनमंजुषेतून ?

☆ स्वागत सोलापुरी☆ शीला पतकी 

स्वागत सोलापुरी – – 

 – – एक संवाद

 

पाच दिवस कोरड्या नळातून परवा पाणी आलं 

दुसऱ्या दिवशी त्यातूनच दुःख गळायला लागलं

 

अरेरे किती हाल.. आणि किती हा त्रास

पाण्यावाचून कसे राहता तेच बघायला आलोय खास

 

ये दुःखा मित्रा ये…

पण दार उघड असताना नळातून? अरे चोर सुद्धा खिडकीतून येतात आणि तू…?????

 

ते चक्क हसले…

मी म्हणलं ये बैस 

अरे पाहुणा आहे का मी…?

इथेच तर राहतो या गावात

 बंद गिरण्यांच्या उजाड आवारात 

कामगारांच्या चाळीत 

कष्टकऱ्यांच्या झोपडीत 

बिडी कामगार बाईच्या दारात 

आणि घरात सुद्धा 

 

अरे ती चक्क रांगोळी काढून स्वागत करते 

 इथल्या धुणे भांडेवाल्या चक्क सतसंगात बसतात 

त्यांच्या मांडीवरची पोर सुद्धा खुदकन हसतात 

कसल्या उन्हात मिरवणुकीत तरुण पोरं नाचतात

अन म्हातारे भक्ति भावाने भजन गातात

 

 सूर्य तापवून पोळवतो

 रस्त्याच्या खड्ड्यातून धूर निघतो.

 वीज सुद्धा मजेत लपंडाव खेळते

 

आता नळाच्या आत पाहिलं ना खपली सुद्धा नाही…

म्हणे खपली धरायला इथे सुखाचा ओलावा कुठेय?

मलाच आपलंसं करून म्हणतात आता दुरावा नाही…!

 

मी म्हणालो ऐक मित्रा

 ईथे कष्टकरी सुखात घोरतात

बेवडे अर्ध्या ग्लासात बुडतात

 

 बायकाना तर ठाऊकच आहे 

तुला पाचवीलाच पुजलंय 

इतक्या सहवासाने त्यांच तुझ्याशीच नातं जडलय…!

 

आमची बांधावरची माय तुला गाण्यात बांधते 

अन घरात दारिद्र्य असतानाही बाई तुला गाडग्यात रांधते 

 

बर सोड.. काय घेतोस सरबत का चहा?

 

शांतता…

दुःख म्हणालं, अरे काय माणसं आहात का काय रे तुम्ही?

अगदी खरं आहे मित्रा माणसंच आहोत आम्ही

 माणूस होण्याच्या रांगेत तुला सोलापूरकर जास्त दिसतील 

 

आम्ही दुःखात सुद्धा सुखाने हसतो 

 

घरी आलेल्या पाहुण्यासह जेवायला बसतो

आमच्या पानातला अर्ध त्याला देतो

 

निघताना निमंत्रण… या पुन्हा या घरी

कारण आम्ही अस्सल सोलापुरी

 

ते खाली मान घालून म्हणाले, येतो 

 

मी हसून…

ये बेsss हा पण नळातून नको

काळजी वाटते तुझीवाट चुकशील

उद्या पाण्याचा वार आहे

 येणाऱ्या पाण्याबरोबर गटारात जाशील

 

???????????

मित्रा

इथे पहिल पाच मिनिट येणार पाणी आम्ही गटारात सोडतो…!!!

 

(खूप जण आम्हाला विचारतात कसं काय करता पाच दिवसांनी एकदा पाणी? त्यांना वाटतं आम्ही या गोष्टीने फार दुःखी आहोत.

– – असल्या छोट्या छोट्या प्रश्नांना डगमगणारा सोलापूरकर नाही

तो दुःखाला सुद्धा कवेत घेऊन भेटतो मित्र म्हणून… आणि म्हणतो… ये बे…! ) 

 

©  शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका, सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ”माणुसकीचा धर्म आणि देवधर्म..” ☆ संध्या बेडेकर ☆

संध्या बेडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ “माणुसकीचा धर्म आणि देवधर्म.. ☆ संध्या बेडेकर ☆

माणुसकीचा धर्म म्हणजेच देव धर्म का??

सध्या पुण्यात वारीमय वातावरण. किती वाट बघतो या दिवसांची. या भव्य दिव्य उत्सवाची. महाराष्ट्रातील एक पारंपरिक सोहळा. पंधरा दिवस चालणारा हा उत्सव. लोकांचे थवेच्या थवे पंढरपूर मार्गी चालताना दिसतात. पालखी प्रस्थान सोहळा बघण्यासारखा असतो. जागोजागी त्यांचे स्वागत, त्यांची व्यवस्था बघणारे सेवेकरी सज्ज असतात. ‘फूल नाही फूलाची पाकळी’ समजून, आपली सेवा म्हणून, लोक श्रध्दाभावाने साधारण जनमाणूस हे सर्व करतो. स्वतः ला धन्य समजतो. मी वारी करू शकत नाही. तेंव्हा जेवढं जमेल तेवढं करावे, अशा विचाराने मनापासून सेवा करण्याचा प्रयत्न असतो त्यांचा.  

पंढरपूर वारी म्हणजे अगदी भक्तिमय वातावरण. विठ्ठलाचा नामगजर, माऊली माऊली चा उदघोष आसमंतात दुमदुमतो. ही वेळ म्हणजे जणू काही वातावरणाचे शुध्दीकरणच चालू आहे असे वाटते. एक वेगळीच उर्जा अनुभवायला मिळते. बातम्या वर्तमानपत्रात अनेक माहिती, घटना ऐकून, प्रमूख पाहुण्यांचे विचार वाचून / ऐकून आपल्याही विचारांत परिवर्तन नकळत होते. नकळत हात जोडले जातात. थोड्या प्रमाणात का होईना घर गृहस्थीतून बाहेर पडून मनात वेगळे विचार येतात. वारी ला जाता आलं नाही म्हणून लोकांची तगमग बघून त्यांच्या श्रद्धेचा अंदाज येतो.

माझी पण देवावर खूप श्रद्धा आहे. देवाचे रोज मी अनेकदा आभारही मानते. मला खूप साग्रसंगीत पूजा करता येत नाही. म्हणजे अगदी साधी रामरक्षा म्हणताना सुद्धा माझे लक्ष इथे तिथे जाते. त्या पाच मिनिटांत पाचशे विचार मनात येतात. मला नेहमी वाटतं जर भक्तांची देवासमोर लाइन‌ लावली तर माझा नंबर कुठे लागेल बरं?? बहुतेक सगळ्यात शेवटचे स्थान मिळेल का मला??

मी वारी करू शकत नाही हे मला चांगले माहीत आहे. माझी शारीरिक शक्ती कमी झाली आहे. किंवा भक्तित तेवढी शक्ति नसावी. मला जमणार नाही असे मात्र वाटते. आपल्याला जेवढं शक्य आहे, आपल्या क्षमतेप्रमाणे देवधर्म करावा. असे मी खूपदा ऐकलंय. वाचलंय. मी माझ्या करिता हाच नियम पाळते.

माझ्या आजीचे एक वाक्य माझ्या मनावर बिंबलेले आहे, ते म्हणजे,  आजी म्हणायची,

“मी माणुसकी चा धर्म पाळते. ” तो धर्म मी लक्षपूर्वक, विचार पूर्वक पाळू शकते. माझ्या सहवासात येणाऱ्या लोकांशी चांगले वागायचे. जमेल तेवढी मदत करायची. हेच माझं आयुष्यातील ध्येय मी ठरवून टाकले आहे. मलाही आजीचे हे विचार, म्हणणे पटले.

खरच लक्ष देऊन बघीतल तर माझ्या आजूबाजूला खूप माऊली दिसतात. पंढरपूर ला जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेता येत नाही. पण माझ्या आजूबाजूला बऱ्याच माऊलींचे दर्शन मला रोज घडते. मला रोज दूधाचे पॅकेट घरपोच देणारा ‘अजिंक्य’, मला घर कामात मदत करणारी ‘साक्षी ‘, ‘मंदाताई ‘, माझ्या घरचा कचरा घ्यायला येणाऱ्या ‘मावशी ‘. रोज न चूकता आपले काम व्यवस्थित पार पाडतात. सर्वांनी कोरोनाच्या कळातही स्वतः चा जीव धोक्यात घालून आमची सेवा केली. मला या नेहमी म्हणायच्या “काकू स्वतः ला जपा. बाहेर निघू नका. काळजी घ्या. “

नाइलाजाने काम करायला घरा बाहेर निघणाऱ्या या माऊली, स्वतः रोज रिस्क घेऊन बाहेर पडतात, तरीही दुसऱ्यांचा विचार करतात. दुसऱ्यांची काळजी घेतात. देवाच्या रूपात असणाऱ्या या माऊलीचे मला रोज दर्शन होते. फक्त पंढरपूर वारी काळातच नाही तर नेहमीच या सर्व माऊली, माझे सख्खे शेजारी माझ्या आजूबाजूला आहेत. हे सर्व माझ्या extended family चेच मेंबर्स आहेत..

देवाला बघीतले नाही. पण देवाचे representative बरेच दिसतात. कोरोना काळात तर माणसातल्या देवाचे दर्शन झाले. जिव्हाळ्याचे ॠणानुबंध असल्याशिवाय कोणी कोणाच्या आयुष्यात येतं नाही. माझे व यांचे पूर्व जन्मीचे काही तरी संबंध नक्कीच असावेत. आपणही नेहमी त्यांच्या समाधानाचा हिस्सा असावं. समस्याचां नाही. त्यांच्या बद्दल आदर असावा.

ही माझ्या’ contact ‘मधे असणारी सर्व मंडळी माझ्या ‘connection’ मधे पण आहे. जीवाभावाचे नाते आहे आमचे. माझा त्यांच्या शी संपर्क आहे, संवाद आहे. आम्ही एकमेकांना समजतो. जाणतो.

हा माणुसकीचा धर्म पाळला तर देवधर्म झाला का??

आपल्या आजूबाजूला समाधान, आनंदी वातावरण ठेवणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. हा एक चांगला संसर्गजन्य रोग आहे जेवढा पसरेल तेवढा चांगला.

“We rise by lifting others “.

म्हणतात ना,

“मधूर संबंध ज्ञान और पैसे सेभी बड़ा होता है।जब ज्ञान और पैसा विफल हो जाता है, तब मधूर संबंध से स्थिति संभाली जा सकती हैं ।”

© संध्या बेडेकर 

वारजे, पुणे.  

7507340231

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “शोध अवकाशाचा” ☆ मोहिनी किंहिकर हेडावू ☆

मोहिनी किंहिकर हेडावू

अल्प परिचय 

कला शाखेतून पदवी घेतली

सध्या नागपूर मध्ये सहायक राज्यकर आयुक्त (Assistant Commissioner of State Taxes)

वाचनाची लिखाणाची आवड. ललित लेखन, कविता तसेच सामाजिक विषयावर लिखाण करायला आवडते. लोकप्रभा, तरुण भारत, देशोन्नती, मातृ सत्ता व जन्मंगळ मधून लेख प्रकाशित झाले.
नुकतच ‘मनातलं’ हा ललित लेखांचा संग्रह प्रकाशित.

??

☆ “शोध अवकाशाचा☆ मोहिनी किंहिकर हेडावू 

अमृता प्रीतम चा चौथा कमरा मला का नसावा?

म्हणून मी माझ्या अवकाशाचा शोध घ्यायचा ठरविले..

“आम्ही नाही बाई, कधी अश्या शोधाच्या मागे लगलो?

पोटापाण्याच्या प्रश्नातच अवकाश गुदमरून गेले… “असे अनेकांचे ताशेरे!

मी दुर्लक्ष केले..

बहिणाबाईंनी कुठे अवकाशाचा शोध घेतला? पण तिला गवसलेचना!

 

“कामात असतानाच ओवीच इन्क्यूबेशन..

तर जात्यावर बसल्यावर, त्या शब्दबध्द व्ह्यायच्या”

एका विदूषीचा मार्मिक टोमणा.

पण मी तिकडे दुर्लक्ष केले..

 

मी जिद्दीने मार्गक्रमण केले.. माझे अवकाश मला गवसले..

शरीराने कात टाकली. आणि मनानेही…

तिथे भाऊसाहेबांनी शायरीची मैफिल!

आर्किमिडीज बाथटब मध्ये युरेका म्हणत बसलेला..!

सिद्धार्थ ला बुद्धत्व प्राप्त होण्याचा क्षण अनुभवला!

तर काही हे क्षण आपल्या आयुष्यात येण्यासाठी रांगा लावून उभे!

मी गर्दीत माझ्यासाठी एक कोपरा शोधला.. उभे राहिले तिथेच… दाटीवाटीत!

ध्रुवला अढळ पदासाठी किती संघर्ष करावा लागला… हे उमगले.. !

‘भगीरथप्रयत्न ‘या शब्दाचा अर्थ ही!

 

मी होते माझ्याच धुंदीत!

मोकळा श्वास घेत!

 

भानावर आले…

पहाते तर मी एकटीच उभे!

सगळे घराकडे परतले.

माउंट एव्हरेस्ट चढल्यावर ही उतरावंच लागत… जगरहाटीत यावेच लागते…

व मीही जागी झाले.

स्वप्नातून…

अन् आले वास्तवात!

© मोहिनी किंहिकर हेडावू

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “यश हे अमृत झाले?” ☆ वर्षा बालगोपाल ☆

वर्षा बालगोपाल 

??

☆ “यश हे अमृत झाले☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

यश हे अमृत झाले सुख स्वर्गीचे आले

दिग्विजयाच्या मनोरथावर नक्षत्रांचे झुलते अंबर

मागेपुढती राजपथावर

लक्ष दीप लागले

यश हे अमृत झाले 

 *

स्तुतिसुमनांचे उधळित झेले जनगौरव तो जयजय बोले

कीर्तध्वजावर लावून डोळे भाग्य पुढे चालले

यश हे अमृत झाले 

 *

वैभव मिरवीत मंदिरी येता दिसेल डोळी ती मंगलता

सुख अंधारी मन व्याकुळता दु:ख सुखे हासले

 *

यश हे अमृत झाले

सुख स्वर्गीचे आले

परि दु:ख सुखे हासले

पुत्र व्हावा ऐसा चित्रपटातील पी सावळाराम यांचे गीत ऐकता ऐकता सुखदा आपला मुलगा सुशील याचे सायकल शिकणे आनंदाने पहात होती. सुशील अंगणात सायकल चालवायला शिकत होता. पहिल्यांदा हाफ पॅडलिंग करता करता दमून गेला. नंतर सीटवर बसण्याचा प्रयत्न करताना दोनदा तीनदा आपटला. हाताला लागलं, कपडे तर मातीत घोळून निघाले. पण तरीही जिद्दीने तो स्वतः सीटवर बसून पूर्ण पॅडलिंग करत सायकल चालवायला शिकला. तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा होता. त्याच्या चेहऱ्यावरचे तेज पाहून सूर्य सुद्धा थोडा ओशाळा झाला असेल.

अतिशयोक्तीचा भाग सोडला तर खरंच कष्टानंतर मिळालेल्या यशाचे वर्णन कितीही केले तरी कमीच असते. खरंच यश हे अमृत झालेले असते आणि त्या यशासाठी घेतलेले दुःख, झालेल्या यातना या सुद्धा सुखात परावर्तीत होतात.

त्या सुखात नकळत अजून चांगल्या गोष्टी कशा दडलेल्या असतात, तर सुशील आनंदात घरात आला. त्याने इकडे तिकडे पाहिले आणि हळूच कोणी नाही पाहून प्रथम बाथरूम गाठले. आपले कपडे पाहून आई रागवेल असे वाटून स्वतःचे कपडे स्वतः धुतले. स्वच्छ आंघोळही केली.

आई सुखदाने सगळे पाहिले होते. त्यामुळे तिने तेल हळद तयार ठेऊन खरचटलेल्या जागेवर ते लावले. लगेच गरम दूध प्यायला देऊन बेसनाचा लाडू पण दिला. आनंदाने जेव्हा सुशिलने आई आता मला सायकल येते हे सांगितले तेव्हा सुखदाने त्याला शाब्बासकी दिली. म्हणाली खरंच खूप आनंद होतोय. पण यशाहुनीही प्रयत्न सुंदर असतात बाळा.

बघ तू पडलास, तुला लागलं तरी तू प्रयत्न सोडले नाहीस जिद्द पक्की केलीस माघार घेतली नाहीस म्हणूनच तुला सायकल तर आलीच. पण आईच्या कामाची जाण येऊन तुला तुझे कपडे धुण्याइतके स्वावलंबी केले. तुला स्वच्छतेचे महत्व वाटून तुला कोणी न सांगताही आंघोळही केलीस.

जीवनातही असेच असते. भिंतीवर तोंडात खाऊ घेऊन जाणारी मुंगी पण खाली खाली घसरते, कधी पडते पण वर जाण्याची जिद्द धरून ती वर जातेच. एडिसनने हजार वेळा प्रयोग करून मग 1001 व्या वेळी ब्लबचा शोध लागला. त्यावेळी त्याच्या मुलाखतीत तो म्हणाला होता की काय केले नाही तर ब्लब लागतो हे मी वेगवेगळ्या हजार मार्गानी शिकलो. अपयश हे आपल्याला अनुभव देत असते आणि तोच मोठा गुरू होउन आपल्याला ज्ञानी करत असते.

सोहनलाल द्विवेदी यांची लहरों से डर कर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। ही कविता आपल्याला एक सकारात्मकता देते.

म्हणूनच यशाचा सागर पार करायचा असेल तर प्रयत्नांच्या बेटांवर विसावायला हवं. ती बेटे कदाचित पैलतीरापेक्षा अधिक सुंदर असतात.

परवाच एक जण अतिशय निराश होउन बसला होता. कारण upsc परिक्षा सलग तिसऱ्यांदा अगदी थोड्या मार्कांने नापास झाला होता. म्हणाला अपयश ही यशाची पहिली पायरी असते हे माहित होते पण येथे तर जीनाच तयार होताना दिसतोय. पण बाळा हे सुद्धा काही खोटे नसते. प्रत्येकवेळी जरी अपयश आले असे वाटत असले तरी तुम्ही यशाच्या कडे अजून थोडे पुढे गेलेला असता. यशाच्या शिखरावर जायला पायऱ्या चढयलाच हव्या. हेलिकॅप्टरने यश शिखरावर उतरणे याला काही अर्थ नसतो. तुम्ही तो जीना नजरेपुढे आणा. पहिली पायरी अपयश, दुसरी पायरी अपयश +निर्धार, तिसरी पायरी अपयश +निर्धार+प्रयत्न, चौथी पायरी अपयश +निर्धार+प्रयत्न +कष्ट, पाचवी पायरी अपयश +निर्धार+प्रयत्न +कष्ट+सातत्य, सहावी पायरी अपयश +निर्धार+प्रयत्न +कष्ट+सातत्य +सराव, सातवी पायरी अपयश +निर्धार+प्रयत्न +कष्ट+सातत्य +सराव+आत्मविश्वास, मग सातव्या पायरीनंतर यश तुमचेच असते. याचा अर्थ अपयशा नंतरपुन्हा तुम्ही तितकी अपयशे पचवण्याची मानसिकता ठेवली पाहिजे असा नाही. तर तुम्ही बाकीच्या सगळ्या पायऱ्या एका दमात सुद्धा चढू शकता आणि पुढच्या वेळेस लगेच यश मिळेलही. पण जर लगेच यश नाहीच मिळाले तर त्याने नाराज होउन प्रयत्न सोडून देण्या पेक्षा पुन्हा पुन्हा प्रयत्न करत राहिले तर यश मिळणारंच हा आत्मविश्वास हवा.

सुशिलला मनोमन पटले आणि तो सहज म्हणाला 

यशाहुनीही प्रयत्न सुंदर 

दिलेस मंत्रा जपे निरंतर 

मिळेल याने मला पुरंदर 

म्हणेल आई मला धुरंदर ||

© वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “माझी वारी ! माझा अनुभव !”- लेख क्र. १ ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

 

??

माझी वारी ! माझा अनुभव ! – लेख क्र. १ ☆ श्री संभाजी बबन गायके 

गोष्ट १९९७ मधली. माऊली हडपसरच्या दुपारच्या विसाव्यावरून दिवे घाटाकडे प्रस्थान करत्या झाल्या होत्या. सकाळपासून शहरात बंद असलेली बससेवा दुपारी काही अंशी सुरु झाली होती. त्यामुळे डेक्कन जिमखान्यावरून हडपसर गाडीतळापर्यंत बस मिळाली आणि दुपारी तीन वाजता दिवे घाटाच्या रस्त्याला लागता आले.

आभाळात तुरळक ढग होते आणि ऊनही होतंच. वातावरणात उष्मा दाटला होता. दिवे घाटाकडे जाणारी वाहने अर्थातच नव्हती. काही पाण्याचे tankers मात्र पुढे जाताना दिसत होते. तसाच चालत निघालो. वाटेत तहान लागली की रस्त्यावर उभ्या असलेल्या tanker मधले पाणी प्यायलो.. जे त्यातील जंतूनाशक औषधामुळे घशाखाली लवकर उतरत नव्हते.. पण इलाज नव्हता. एकतर त्या दिवशी एकादशी असल्याने सकाळी केलेल्या थोड्याशा फराळावरच दिवस ढकलला होता. दिवे घाटाच्या ओढीने पावले झपाझप पडत होती.

मागील काही वर्षे दिंडीसोबत पुणे ते सासवड आणि पुढे पंढरीपर्यंत पायी वारी घडल्याने घाटातील सुंदर वातावरणाच्या आठवणी मनात दाटून आलेल्या होत्या. वेगाने वाट चालणारे वारकरी, दिंडीची वाहने आणि टाळ मृदुंगाचा ध्वनी अजूनही कानांत घुमत होता. घाटाचा रस्ता काहीसा एका बाजूला उताराचा असल्याने उजव्या पायावर शरीराचे वजन आपसूक जास्त येते. पुढची दिंडी थांबली की आपल्यालाही थांबावेच लागते… त्यावेळी मांडीच्या खुब्याचे हाड आपल्याशी बोलू लागलेले असते. पण तिकडे फारसे लक्ष जात नाही. घाट हिरवागार आणि माणसांच्या अंगावरील वेशाने पांढरा शुभ्र दिसत असतो. त्यात पावसाची एखादी सर येऊन गेली की तो गारवा मनात आनंदाची बरसात करीत राहतो. माऊली… माऊली करीत वारक-यांचे जत्थे पुढे पुढे धावत असतात. पुण्यापासून सासवड हा टप्पा तसा बराच मोठा आहे.

वारीत दोन प्रकारची माणसे चालत असतात. ज्यांच्या स्वत:च्या स्वतंत्र दिंड्या आहेत, त्यांची मुक्कामांची जागा आधीच ठरलेली असते. इतर लोक मिळेल तिथे राहतात, खातात आणि वारीसोबत चालत राहतात. वारीत व्यवासायानिमित्त सहभागी असणा-या लोकांची, भिका-यांची संख्याही मोठी असते.

संध्याकाळचा अंधार जवळ येऊ लागला आणि सासवड जवळ येऊ लागले की दिंडीतील वारक-यांना एकत्रित चालणे गरजेचे होऊन जाते. अन्यथा गर्दीमुळे पुढच्या दिंडीत आणि आपल्या दिंडीमध्ये थोडे जरी अंतर पडले आणि चुकामुक झाली की त्या लाखोंच्या समुद्यात आपली दिंडी आणि तिची मुक्कामाची जागा सापडणे महामुश्किल होऊन जाते… असा अनुभव पाठीशी असतो. त्यामुळे सासवड जवळ येताच लगबग वाढते.

दिवे घाटमाथा ते सासवड पालखी तळ हेही अंतर मोठे आहे. त्यामुळे वारकरी लोकांची बरीच दमछाक झालेली असते. उपवास असल्याने तशी शारीरिक ताकद कमीच असते. पुण्यातील विश्रांतीनंतरचा हा मोठा टप्पा असल्याने वारकरी काहीसे थकलेले असले तरी मनात उत्साह मोठा असतो.

मी वेगाने चालत निघालो. आणि एका वळणावर मला वारका-यांचा एक गट चालताना दिसला. त्यांना गाठले तर पुढच्या वळणावर चक्क माऊलींचा रथ… घाटातील चढावर चढण्याच्या प्रयत्नात! आधी विश्वासच बसेना… जवळ जाऊन पाहता परिस्थिती लक्षात आली. त्यावेळी रथ बराच जड असे. बैलांच्या अनेक जोड्या लावून रथ ओढावा लागे. वारकरी मंडळी घाईत असल्याने रथाला ओलांडून केंव्हाच पुढे गेली होती. रथापुढे क्रमांक एकची दिंडीसुद्धा बरीच पुढे गेली होती. रथासोबत असलेल्या पाच-पन्नास लोकांनी, सेवेकरी, पोलिसांनी बैलांच्या जोडीने रथ वर वर ढकलत चालवला होता. माऊली! माऊली! असा गजर करीत एका एका चढाचे अवघड वळण पार केले जात होते… मी ही जमेल तसा हातभार लावला!

काही वेळातच पुढे चालणारा जनसमुदाय आणि पालखी रथ यांच्यात योग्य समन्वय साधला गेला. सासवडची भजनी मंडळी घाटाच्या माथ्यावर स्वागतासाठी दिंडी घेऊन आलेली होती… माऊली आता सासवडच्या वेशीतून प्रवेश करत्या झाल्या होत्या! 

घाटाच्या शेवटच्या टोकावर पुण्यातल्या अनेक व्यापा-यांनी त्यांच्या मालगाड्या आणून आधीच उभ्या करून ठेवल्या होत्या… आणि त्यांच्या मार्फत वारक-यांना फराळाचे पदार्थ, उपयोगी वस्तू यांचे मुक्तहस्ते वितरण सुरु होते… ! 

मला पुण्यात तसेच रात्री माघारी यायचे होते. याच मालट्रकमधून येण्याची परवानगी एका चालकाने दिली. अंधार पडू लागला होता. मालट्रक परतण्याच्या तयारीत होते. एवढ्यात मला घाटातून खालून तीन आकृत्या चालत येताना दिसल्या… दोन महिला आणि एक वयस्कर पुरुष! पुरुषाच्या पायात काटा रुतल्याने त्यांचा पाय सुजला होता. पत्नी आणि सूनबाई यांच्या साहाय्याने ते वारकरी गृहस्थ एवढा मोठा घाट चढून आले होते… म्हणून त्यांना एवढा उशीर लागला होता! 

यावेळी पुण्यातून सासवडकडे दिवे घाट मार्गे वाहनांची वाहतूक पूर्ण बंद असते. पण कसा कुणास ठाऊक एक मिनीट्रक मागून येताना दिसला… ! मी त्या वाहनाला आडवा होत वाहन अडवले. चालक नाखुशीनेच थांबला… वाहनाच्या मागच्या बाजूने त्या वारकरी बाबांना वर चढवण्याचा प्रयत्न करू लागलो. पण त्यांच्या पायाला मोठी सूज, वेदना असल्याने त्यांना वेळ लागला… बाबांना वर चढता आलेच नाही.. आणि का कुणास ठाऊक त्या चालकाने त्याचे वाहन पुढे दामटले… आम्ही आवाज देत राहिलो… पण तो चालक वाहन घेऊन निघूनही गेला! त्या दोन महिला आणि ते वारकरी बाबा खालीच राहिले… तेथून त्यांचा सासवड मुक्काम किमान चार-पाच किलोमीटर्स तरी दूर असावा! 

मी वाहन थांबवण्याचा प्रयत्न केल्याबद्दल बाबांनी मला तोंडभरून आशीर्वाद दिला… आणि म्हणाले… ”असू दे, बाळा! माऊली घेऊन जातील आम्हांला!” आणि असं म्हणत ते तिघेही हळूहळू सासवडच्या दिशेने निघाले. मी त्यांना खाली वाकून नमस्कार केला. माझ्याकडे असलेले फराळाचे पदार्थ त्यांच्या हाती सोपवले!

अंधारून आले होते… मागून एकही वाहन येताना दिसत नव्हते. मी त्या तिघांच्या पाठमो-या आकृत्यांकडे पहात राहिलो… माझे वाहन पुढे निघाले! घाट उतरेपर्यंत वर येणारे एकही वाहन नजरेस पडले नाही! ती तीन माणसं त्यांच्या मुक्कामाला किती वाजता, कशी पोहोचली असली असतील हा एकच विचार मनात सातत्याने येत राहिला! माउलींनी त्यांना सुखरूप नेले असेलच याची खात्री होती! 

दरवर्षी पुण्यातून माऊली दिवेघाटाकडे निघतात तेंव्हा त्या तीन वारक-यांची आठवण आल्याशिवाय रहात नाही! रामकृष्णहरी! 

 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “पाशवी ?” ☆ कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त)☆

कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त)

??

☆ “पाशवी ?” ☆ कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त) ☆

अमानवी, अमानुष किंवा पाशवी हे शब्द अनेकदा माणसांनी केलेल्या कृत्यांसाठी वापरले जातात. बऱ्याच काळापासून ते शब्द मला खटकत आले आहेत. विशेषतः ‘पाशवी’ हा शब्द तर फारच त्रास देतो. ते शब्द अप्रस्तुत वाटण्यामागे माझी काही कारणेही आहेत.

आज त्याबद्दल लिहावेसे वाटण्यासाठी तात्कालिक कारण म्हणावे, तर नुकतीच घडलेली एक घटना वाचनात आली.

पण मुळात, ते शब्द मला का खटकतात? 

मनुष्यप्राण्याच्या हातून घडणाऱ्या काही कृत्यांच्या संदर्भात हे शब्द सर्रास वापरले जातात. उदाहरणार्थ, कुठेतरी कौटुंबिक वादामुळे, किंवा व्यावसायिक शत्रुत्वातून उद्भवलेल्या कडाक्याच्या भांडणानंतर एका गटाचे लोक दुसऱ्या गटातल्या निरपराध व्यक्तींनाही जीवे मारतात. अशा घटनेनंतर ‘अमानुष नरसंहार’ अशा मथळ्याखाली ती बातमी छापून येते.

बलात्काराच्या घटनांमध्येही अमानवी, पाशवी अशी विशेषणे नेहमी वाचनात येतात. पुण्याजवळ नसरापूर येथे नुकत्याच घडलेल्या एका घटनेचेही वृत्तांकन करताना, ‘पाशवी अत्याचार’, ‘माणुसकीला काळिमा’ अशी विशेषणे वाचनात आली.

एका बाबतीत कोणाचेही दुमत असणार नाही की, मी उदाहरणादाखल दिलेल्या सर्वच घटना निंदनीय आहेत, आणि कोणाच्याही हातून कुठेही त्या घडल्या तरी मनात चीड उत्पन्न होतेच. अगदी दूर कुठेतरी युरोपीय देशांमधल्या ज्यू-धर्मियांवर, ८०-८५ वर्षांपूर्वी हिटलरच्या सैन्याने केलेल्या अत्याचारांबद्दल आपल्याला आजही घृणाच वाटते.

आपण या अत्याचारांसाठी ‘अमानवी’ हा शब्द जेंव्हा वापरतो तेंव्हा त्या शब्दात असाही अर्थ गर्भित असतो का, की मानवजातीच्या प्राण्यांच्या हातून अपेक्षित नसली तरी, इतर जातीच्या प्राण्यांकडून तशी कृत्ये घडू शकतात? माझा नेमका आक्षेप त्याच गर्भित अर्थाला आहे. ‘पाशवी’ हा शब्द वापरताना तर तो अर्थ गर्भितदेखील नसतो. आपण सरळ-सरळ असेच म्हणत असतो की ते कृत्य पशूकडून घडले तर काही नवल नाही!

पण हे तर सर्वमान्य आहे की कधीकधी एखादा प्राणी किंवा पक्षी, निव्वळ भीतीपोटी आणि स्वसंरक्षणार्थ दुसऱ्या प्राण्या-पक्ष्यावर हल्ला करतो. तसेच एखाद्या पशूला जर भूक लागली तर आणि तरच तो दुसऱ्या प्राण्याची हत्या करून आपली भूक भागवतो. पण त्यातदेखील एक विलक्षण सत्य दडलेले आहे. सर्वसाधारणपणे, कितीही भूक लागलेली असली तरी पशू भक्ष्य शोधत रानोमाळ हिंडतो, पण सहसा आपल्या जातीच्या प्राण्याला मारून खात नाही. अपवादात्मक परिस्थितीत कदाचित तसेही घडतही असेल.

त्याचप्रमाणे, लैंगिक भूक भागवण्यासाठी एखाद्या पशूने बलात्कार केल्याचे माझ्या तरी ऐकिवात नाही. त्यासाठीही पशूजातीतल्या नराकडून मादीची, किंवा मादीकडून नराची मनधरणी केली जाते आणि त्यानंतरच त्यांचा समागम होतो असे मी ऐकले-वाचले-पाहिले आहे.

परंतु, मनुष्य हा एकमेव प्राणी असेल जो भुकेपोटी नव्हे तर इतर भावनांच्या प्रभावाखाली चोरी, दरोडे किंवा हत्या करतो. केवळ मनुष्यप्राणीच आपली लैंगिक भूक भागवण्यासाठी बलात्कार करतो. मग त्याच्या कृत्यांना ‘पाशवी’ म्हणणे कितपत सयुक्तिक आहे?

आता, हे सगळे विचार आजच लिहावेसे मला का वाटले?

… आजच वर्तमानपत्रात फोटोसह आलेली एक बातमी वाचली. गुजरातमध्ये पालिताना तालुक्यातल्या गरजिया नावाच्या गावी, काळू परमार नावाचा एक माणूस गुरे चारण्यासाठी रानात गेला होता. अचानक एका सिंहिणीने त्याच्यावर झेप घेऊन त्याला खाली पाडले. त्यानंतर ती सिंहीण त्या माणसाच्या पायावर आपले वजन ठेवून बसून राहिली. त्याच्या नरडीचा घोट ती अगदी सहज घेऊ शकली असती. पण तिने तसे केले नाही. त्या बिचाऱ्या माणसाला फारसे काहीच करता येत नव्हते. पण तिथे जमलेल्या गावकऱ्यांनी दगड मारून त्या सिंहिणीला पळवून लावायचे प्रयत्न सुरु ठेवले. बऱ्याच प्रयत्नांती, ती सिंहीण उठून रानात पळून गेली आणि काळू परमारचा जीव वाचला.

अधिक माहिती अशी समोर आली की त्या सिंहिणीने नुकतीच एक शिकार केलेली होती. कदाचित ती भुकेजलेली नसेलच. आणि म्हणूनच तिने काळूला जीवे मारले नाही!

आता या घटनेला लोक असेही म्हणण्याची शक्यता आहे की, “त्या सिंहिणीने काळूला जिवंत सोडून अक्षरशः ‘माणुसकी’ चा प्रत्यय दिला!”

खरे पाहता, इतकेच म्हणता येईल की त्या सिंहिणीने केवळ ‘पशुधर्म’ पाळला !

 

© कर्नल आनंद बापट ( निवृत्त ) 

 मो  9422870294

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ पाऊस आला गं… ☆ संगीता कुलकर्णी ☆

संगीता कुलकर्णी

? मनमंजुषेतून ?

☆ पाऊस आला गं ☆ संगीता कुलकर्णी ☆

पावसाळा म्हटलं की मला प्रथम आठवतो तो मन धुंद करणारा मृद्गंगंध… ! पहिल्या पावसाची गोष्टच काही वेगळी… ! त्याचे आणि माझे नाते खरंतर जिव्हाळ्याचे.. पाऊस आला की मी खिडकीत उभी राहून त्याच्याशी बोलू लागते त्याचा थंडगार वारा मनाला सुखावून जातो आणि शब्द उसळ्या मारू लागतात… शब्दांना पूर घेऊन एक वेडा पाऊस आला… !

 आला आला

 पाऊस आला

 मला भिजवून ओलेचिंब करुन गेला

पहिल्या पावसाच्या सरी अंगावर बरसू लागल्या की येणार्‍या मृगाची चाहूल लागते.

सर्वच या सृजन सोहळ्याची आतुरतेने वाट पाहत असतात.. पहिल्या पावसाची आतुरता या सृष्टीतल्या प्रत्येक न् प्रत्येकाला ही असतेच ना.. !

पहिल्या पावसाच्या वेळी जेव्हा आकाश भरून येते तेव्हा सृष्टीची किमया डोळे उघडे ठेवून बघत रहावी अशीच…

 पावसाची सर

 कोसळत होती 

 भिजताना सृष्टी

 उमलत होती

चिंब भिजलेल्या सृष्टीचा किमया मी मनात रेखाटत होते.. निळेभोर दिसणारे आभाळ एकदम काळेसावळे होते… ढगांची गर्दी… ढगांचा एकमेकांवर आदळणारा आवाज..

तो आवाज ऐकला की टाळ मृदुंगाशी स्पर्धा करतो की काय असा भास मला होतो.. चिंब भिजलेल्या सृष्टीचा अप्रतिम सुंदर 

देखावा मनात रेखाटत मी पावसाकडे बघत होते… सृष्टीतील त्या चैतन्याचा तो सोहळा डोळ्यात भरून घ्यावा आणि कानात साठवून ठेवावा एवढा नादमय… पाऊस म्हणजे अख्या सृष्टीला वेड लावणारा अद‍्भूत सोहळा… ! 

 आसुसलेली धरणी 

 मिलनासाठी

 दोन हातांचे पंख

 पसरून उभी

पहिल्या पावसाच्या पहिल्या थेंबाने धरणीला स्पर्श होताच पावसाचे ते अगणित थेंब मातीत जेव्हा मिसळतात तेव्हा माती गर्भवती राहून तिच्या कुशीतून बीजाला कोंब फुटतो. तुकारामांच्या भैरवीतली “तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी” हा संदर्भ मातीला या काळात तंतोतंत लागू पडतो.

मातीचा तो धुंद वास…त्याने सुखावत होती.

हसताना मृद्गंगंध पसरवीत होती..

बहरत होती… लाजत होती आणि लाजून चिंब चिंब होत होती.

तो मृद्गंगंध श्वासात किती आणि कसा भरून घ्यावा… !

हा पाऊस आसमंतात एक नवं चैतन्य फुलवतो, सर्वांची तहान भागवितो, मातीत थेंब पडल्यावर पसरणारा तो मृदगंध अगदी उरात साठवावासा वाटतो..

वातावरणात विलक्षण गारवा येतो.

मृगाच्या पावसाचे आणि सृजनाचे एक विलक्षण असे नाते आहे. वळवाचा पाऊस आणि मृगाच्या पावसात तसा जमीन आसमानाचा फरक … वळवाचा पाऊस एकदा लागून गेला की तो नुकसानच करून जातो पण मृगाचा पाऊस तो आला की सगळ्यांना सुखावून जातो… सृष्टीतील सर्वांना तो वेड लावतो. पहिला पाऊस नवीन चैतन्य घेऊन येतो. मनाला जगायला नवीन उभारी देतो.

आयुष्यातले छोटे छोटे आनंदाचे जगण्याचे क्षण पहिला पाऊस मिळवून देतो.

माझ्यासाठी प्रत्येक नव्या क्षणी येणारा पाऊस हा पहिलाच असतो कारण मला तो दरवेळी एक नवी कविता देऊन जातो. मला त्या पावसात गुंतून राहणं आवडत.. जमतं… तो स्वत:हून मला भावना देतो… मला आशय पुरवतो. पाऊस सोबत केवळ गार हवा किंवा चिंब सरीच घेऊन येतो असं काहीच नाही तर पाऊस त्याही पलीकडे जाऊन प्रीत, विरह, आनंद यांसारख्या बऱ्याच भावना सोबत घेऊन येतो… पहिल्या पावसात त्याने मला भिजत असलेली पाहून जो मनमुराद आनंद लुटला त्या क्षणाची तुलना किंचीतच दुसऱ्या क्षणाशी होईल… मला बेधुंद जगताना पाहून त्यालाही पावसात भिजायची इच्छा झाली होती… पहिल्या पावसाचे ते थेंब अलगद ओठांनी चुंबूनी घ्यावेसे वाटतात…

पाऊस आणि आठवण या दोघांचे घट्ट नाते आहे फरक फक्त इतकाच की पाऊस शरीराला भिजवतो आणि आठवणी कायम मनाला… ! या हृदयाचे त्या हृदयी अशी अवस्था… छळणारा, जाळणारा तरीही हवाहवासा वाटणारा पाऊस…!

©  संगीता कुलकर्णी 

लेखिका /कवयित्री

ठाणे मो. 9870451020

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ”द्वंद्व मनातले..” ☆ संध्या बेडेकर ☆

संध्या बेडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ “द्वंद्व मनातले.. ☆ संध्या बेडेकर ☆

हो की नाही ?? बरोबर की चूक ??

योग्य वर्तन की अयोग्य वर्तन ?? खूपदा हे द्वंद्व आपली परीक्षा घेत असत.

आज सकाळी आमच्या घरी काम करणाऱ्या मावशी म्हणाल्या.

काकू माझ्या जावेची आई वारली हो.

मी म्हटलं,

अरे !! हो का ? मग तुम्ही गेल्या नाही. का बरं ? 

 मला या लोकांचं खूप कौतुक वाटतं 

ही मंडळी नातीगोती आपल्या पेक्षा जास्त छान सांभाळतात.

माहेरी सासरी कोणताही कार्यक्रम असो, या बस चां प्रवास करून तेथे नक्की जाणार. आज पाऊस आहे, ऊन आहे असे प्रश्न यांना पडत नाहीत बहुतेक.

बरं ! असंही नाही की त्या दिवशी त्या कामाला येणार नाही. पायी चालत येणे, काम करणे, पुन्हा घरी पायी जाऊन, बसने दोन तासांचा प्रवास करून, तेथून पुन्हा पायी चालत कधी कधी तर भर चिखलात चालून त्या तेथे पोहचतात.

कौतुक आहे. नाही का ?? 

आपल्या सारखं (म्हणजे मी माझ्या बद्दल बोलतेय) नाही की आपल्या सोयीनुसार आपण जातो किंवा फोन करून आपलं कर्तव्य पार पाडतो.

असं म्हणतात,

एकवेळ सुखात सहभागी झालं नाही तरी चालेल, पण दुःखात माणसाने जरूर जावे, आधार द्यावा.

मावशी म्हणाल्या,

काकू ! जायला तर हवं होत हो, पण मी नाही गेले. त्या पूढे म्हणाल्या,

काल पूर्ण दिवस याच विचारात गेला. एक मन म्हणतं होत जायला पाहिजे, तर दुसरं मन जून्या घटनेची सारखी आठवण करून देत होतं.

 काकू!! दोन वर्षांपूर्वी माझे आई वडील दोघेही गेले, पण या माझ्या जावेने एकदाही विचारलं नाही. साधी चौकशी ही केली नाही. आता आमची लोक पण फोन वगैरे करतातच की. पण एक फोन सुद्धा केला नाही हो.

न येण्याचे खोटे कारणही सांगितले नाही.

फक्त पाऊस पडला की भात लावायला ये असा फोन न चूकता करतात.

 काकू! श्रीमंतीचा भारी माज आहे तिला. हेच जर एखाद्या श्रीमंत घरात घडलं असतं, तर लगेच धावत गेले असते.

बरं! हे असं वागणं काही पहिल्यांदाचच आहे, असं नाही.

मी बरोबर नक्कीच वागले नाही, पण त्यांना त्यांच्या वागण्याची जाणीव केंव्हा होईल ? 

 काल मी देवाची माफी सुद्धा मागितली.

म्हंटल,

देवा !! आजचे दोन नंबर कापून घे बाबा. पण यावेळी मी असंच वागणार. या दोन नंबरची भरपाई मी कधी तरी करेन.

 गरीबांच्या घरचे मरण म्हणजे मरण नाही का ? काहीच संवेदनशील घटना नाही का ?? 

प्रत्येक वेळेस यांची श्रीमंती महत्वाची, कौतुकाची का ?? 

खरं तर त्यांच्या आईचा काहीच दोष नाही हो यात, पण मी गेले नाही.

माझ्या लक्षात आलं,

हा श्रीमंतीचा रोग समाजातील प्रत्येक पातळीवर आहे.

या रोगाने पछाडलेल्या लोकांची जमात सर्व ठिकाणी आढळते.

अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणारे लोक बरेच असतात.

तसं मला मावशीचे म्हणणे पटले. अगदी सहज सुलभ प्रत्येकाच्या मनात येणारे हे विचार आहेत.

असे प्रसंग आपल्याला दुविधेत टाकतात. आपली चूक कळत असते, पण झालेला अपमानही लक्षात असतोच ना.

योग्य वर्तन विरुद्ध (×) अयोग्य वर्तन या मध्ये खडाजंगी युद्ध चालू असत.

 आपलेच प्रश्न ? त्यावर आपणच दिलेली उत्तरे, नंतर उत्तरांचे विश्लेषण. यांचे जणू पारायण सुरु असते. एका विचारांवर थांबल्या नंतर पुन्हा थोड्या वेळाने तीच सायकल सुरू होते.

हो. की. नाही ???

 यापैकी एकावर येऊन गाडी काही लवकर थांबत नाही. असं किती तरी वेळ / कधी कधी तर बरेच दिवस हा खेळ मनात चालू असतो. यावेळी अनेक वाचलेले सुविचार ही आठवतात.

 कोणी कसं वागावं ? हे आपल्या हातात नाही. पण आपण नेहमी व्यवस्थित वागावं ना.

असं वागल्याने खरंतर ते स्वतःचाच अपमान करतात. आपला कुठे झाला ?

 असे एक ना अनेक विचार मध्ये मध्ये लुडबुड करतात. आपला निर्णय बदलण्याचा प्रयत्न करतात 

पण का ? का म्हणून नेहमी ऐकायचं ? सहन करायचं ? त्यांचे ऐकत राहिले तर समोरच्या ची हिम्मत वाढते. आपण काहीही करू शकतो, कसेही वागू शकतो, असा त्यांचा समज कधीतरी दूर केलाच पाहिजे.

They should not take us for granted.

बरं एवढं करून श्रीमंत म्हणजे असे काही गडगंज वगैरे नाही. आणि असले तरी त्यांच्या दाराशी आम्ही उभे आहोत का ?? 

मोठी कार, डोळ्यांवर मोठा गॉगल्स, हातात मोठा मोबाईल, मग तो आय फोन असेल तर अजून स्मार्ट, अजून श्रीमंत समजून वागणारे लोक आजूबाजूला बरेच दिसतात.

दोन चार वाक्य इंग्रजीचे बोलता आले तर श्रीमंतीत अजून दोन डिग्री ची वाढ.

 हीच श्रीमंती, हाच स्मार्टनेस बस. बाकी कांक्रीट असं काही दिसत नाही त्यांच्यात.

खरं तर 

Making other people feel small, doesn’t make you big.

अशा लोकांशी वागायची आपली एक पॉलिसी आपल्यालाच तयार करायची असते.

 माझं माझं मी ठरवलंय. अगदी पहिल्या च अनुभवावरून नाही, पण जर असं वागणं नेहमीचच झालं तर, मग मात्र काही तरी ठरवावच लागत. त्यावेळी 

I follow the Principle.

Forget the past but Remember the lesson.

Moral in my life is very simple.

You treat me good, I will definitely treat you better.

कधी कधी आपल्याला आपल्याच वागण्याचे कारण लक्षात येत. की 

We have reduced communication to the people we love, not because we hate them but because they make us feel like, we are nothing to them.

चांगले संबंध नक्कीच असावेत, पण ती काय एकाच पार्टीची जबाबदारी असते का ??

I follow these principles in my life.

मावशीचे बोलणे ऐकून, मी आपल्याच विचारात दंग होते.

मावशींच्या बोलण्याने पुन्हा भानावर आले.

त्या विचारत होत्या,

काकू !! मी बरोबर बोलतेय का ? माझ वागणं एकदम चूकच आहे का ? 

आता काय उत्तर द्यावं ?? कळेना मला.

मी म्हटलं,

“कुसुम ताई कोणावर एवढं नाराज होऊ नका. ” त्याच महत्व आपल्या आयुष्यात कमी करा. पण या अशा प्रसंगी जाऊन या.

तुम्हालाच बरं वाटेल.

नाहीतर तुमच मन तुम्हाला खात राहील.

 शैवटी मला माझंच कौतुक वाटलं. समाधान मिळाल.

चांगले बरोबर विचारांनी चूक अयोग्य वर्तनावर मात केली.

म्हणतात ना,

Be a good person but do not waste time to prove it.

© संध्या बेडेकर 

वारजे, पुणे.  

7507340231

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ घटा घन घोर घोर — एक आठवण ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

श्री दिवाकर बुरसे

??

☆ घटा घन घोर घोर — एक आठवण ☆ श्री दिवाकर बुरसे

 चाळीस – पंचेचाळीस वर्षापूर्वीची गोष्ट. पुण्यात लक्ष्मी क्रीडा मंदिरात, एका पावसाळ्यातल्या शनिवारी रात्री ९ वा. पंडित भीमसेन जोशींचा “पावसाळी राग”हा गायनाचा कार्यक्रम ठरविला होता. प्रवेश मूल्य रु ३/-फक्त!

शुक्रवार सकाळपर्यंत केवळ बावीस तेवीस प्रवेशिका विकल्या गेल्या होत्या. या कार्यक्रमात आपण सपाटून मार खाणार याचा अंदाज ठेकेदाराला आला. त्याने दुपारीच आण्णांचे घर गाठले. मी त्याच्याबरोबर होतो. आण्णांच्या अंगात ताप होता. गाणं होईल की नाही अशी शंकाच होती. ठेकेदाराने त्यांना रडून परिस्थिती सांगितली. “गाऊ शकाल का उद्या? ” विचारले. मानधन कमी करण्याची विनंती केली. त्यावर आण्णा म्हणाले, ” हो रे हो, नक्की गाईन आणि ते मानधनाचे नंतर बघू आपण. आधी गाणे तर ठरल्याप्रमाणे होऊ दे. “

शनिवारी संध्याकाळपर्यंत काही तिकीट विक्री झाली.

कार्यक्रम रात्री ९चा. पंडितजींना घ्यायला मी त्यांच्या घरी रात्री आठ वा. पोहोचलो. ते जेवायला बसतच होते. घरात जाताच ते म्हणाले, “बसा. दोन घास जेवून घेतो. म्हणे रात्री xxxxx मोकळा. “

पावणे नऊ वा. त्यांना घेऊन हॉलवर आलो. तिकीट विक्रीच्या टेबलाभोवती काही रसिक उभे दिसले. आत गेलो. साथिदार आधीच येवून बसलेले. वाद्ये लावायला आरंभ केला. पेटीवाल्याने सूर दिला. पंडितजींनी एकेक तंबोरा लावायला सुरवात केली. बाहेर हॉलमधे रसिक जमायला लागले. पंडितजींच्या अंगात कणकण होतीच. साडेनऊ वाजले.

पंडितजी खांद्यावर शाल पांघरून स्वरमंचावर अवतरले. रसिकांना अभिवादन करून बसले. पुन्हा एकदा वाद्ये लावण्याचे सोपस्कार झाले. श्रोतेही जमायला लागले. चित्र बदलत होते.

आण्णांनी आपला धीर गंभीर आवाज लावला आणि काय, सगळा आसमंत क्षणात त्यांच्या भारदसत, गंभीर षड्जाने भरून गेला! बुवांनी मिया मल्हार गयला आरंभ केला.

इकडे बघता बघता प्रेक्षागार रसिकांनी भरायला लागले, भरू लागले, ओसंडून वहायला लागले!

पंडितजींनी अंगावरची शाल मांडीवर आंथरली. आणि पुढे रात्री अडीच पर्यंत असे काय गायले की बस्. श्रोते ते गाणं अवाक् होऊन ऐकत होते. एक एक रचना रंगत होती.

रामदासी मल्हार नंतर बुवांनी श्रोत्यांना विचारले, ” आता पुरे ना? अडीच वाजले आहेत रात्रीचे” ते पुणेरी रसिक. नाही कशाला म्हणतायत. पुन्हा एक छोटीशी रचना गाऊन पंडितजींनी गाणे थांबविले. ती बैठक भैरवी शिवाय संपली!

फक्त मल्हार आणि मल्हारचे विविध प्रकार संपन्न हाले आणि श्रोते अक्षरशः त्या सुरांच्या वर्षाधारात नखशिकांत नाहून निघाले. पंडितजींचे सर्वांग घामाने डबडबले होते, घामच्या धारा अंगांगातून निथळत होत्या!

श्रोते निघून गेले. स्वरमंच आणि प्रेक्षागार सुने सुने झाले.

आता व्यवहारपूर्तीचा क्षण आला. ठेकेदार द्रव्याचे पाकीट आणि नारळ घेऊन उभा ठाकला. पंडितजींच्या हातात मानधनाचे पाकीट ठेऊन त्याने बुवांना खाली वाकून नमस्कार केला. बुवा त्याला खांद्याला धरून उठवीत म्हणाले, “पाकीट तेवढेच आहे ना रे? जीव ओतून गायलोय आज. ” तू समजत होतास तसे काही झाले नाही. पुणेकरांनी गर्दीच केली होती नेहमीप्रमाणे”.

ठेकेदार काय बोलणार! त्यानेही समजून दोन नोटा अधिकच ठेवल्या होत्या मानधनाच्या पाकिटात.

 चक्क पूर्ण २२००/- रुपये

– – खरं सांगू, केवळ पुण्यात वास्तव्य असल्यामुळे पं. भीमसेन, वसंतराव, छोटा गंधर्व, हिराबाई, पु. ल. राजा परांजपे, अभिनेते विवेक, नृत्यांगना रोहिणी भाटे, चित्रकार रवी परांजपे, शि द फडणीस, मंगेश तेंडुलकर, रोहिणी हट्टंगडी, मोहन आगाशे, मोहन गोखले, ग वा बेहेरे, सी रामचंद्र, आबासाहेब मुजुमदार, बाबासाहेब पुरंदरे, गो नि दा, इ इ. इ…

– – अशा अनेक गुणीजनांचे प्रत्यक्ष सहवास लाभले. रँ परांजपे, महर्षी आण्णा कर्वे, स्वा सावरकर, बालगंधर्व, मा कृष्णराव, मेहेरबाबा, स्वामी माधवनाथ, गुळवणी महाराज, स्वामी विद्यानंद, सूफी संत बियाबानी, मामा दांडेकर, बॅ जयकर, इ. इ. थोरांची प्रत्यक्ष दर्शने घडली. या विषयी मी भाग्यवान तर आहेच!

🙏🏻

© श्री दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ पहाट… ☆ राधिका भांडारकर ☆

राधिका भांडारकर

??

☆ पहाट… ☆ राधिका भांडारकर ☆

रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उषःकाल

कुसुमाग्रजांच्या या एका ओळीतच पहाट या शब्दाचा खरा अर्थ दडला आहे. रात्रीचा अंधार संपतो आणि हळूहळू सूर्याची किरणे निळ्या आभाळाला रंगवत पसरत जातात. काल संपलाय, कालचा अंधार नाहीसा झालाय आणि आज पुन्हा पहाट झाली आहे. ही पहाट नवी आहे, नव्या स्वप्नांना, नव्या आशा आकांक्षांना घेऊन आली आहे.

पहाट म्हणजे नवा प्रहर, नवी भविष्यं, नवी उर्जा, नवी ध्येयं. पहाट म्हणजे निर्मितीचा काळ आणि “झालं गेलं विसरून जा आता पुन्हा नव्याने करू सुरुवात” असा संदेश घेऊन येणारा दिवसाचा एक महत्त्वाचा प्रहर.

कोंबडं आरवतं, तांबडं फुटतं, पक्षी घरट्यातून किलबिलत बाहेर पडतात, फांदीवर फुलं उमलतात, तळ्यात कमल दले उलगडतात, भ्रमराची मुक्ती होते, अंगणात प्राजक्ताचा सडा पडतो, सुवासिनी सुस्नात होऊन दारची तुळस पूजतात, सडा शिंपतात, रांगोळ्या रेखातात, देवळातली घंटा निनादते, मंत्रोच्चारांचा गजर होतो. सारं वातावरण कसं पवित्र, मंगलमय, प्रसन्न असतं! जणू सारं जळमट झडून जातं आणि पहाटेच्या या प्रहरी एका नव्या उर्जेने, नव्या क्षमतेने जीवन बहरू लागतं. उदया चली नित्य येणारा हा भास्कर जणू पहाटे काना कानात गुणगुणतो,

घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला

उठ आता आणि कामाला लाग.

विश्वाच्या कोपऱ्या कोपऱ्यातील पहाट वेगळी असेल. कुठे धुक्यात लपेटलेली असेल, कुठे दवबिंदूत भिजलेली असेल, बर्फाचे कण पांघरून निवांत कुडकुडत असेल, कुणाच्या मिठीत असेल, शृंगाररंगात थकलेली असेल, कुठे धावत असेल, कुठे चालत असेल पण एक मात्र नक्की की साऱ्या झोपलेल्या चराचराला ती गती देत असते. जाग देते, जाण देते, शक्ती— बळ देते.

पहाट ही नेहमीच सकारात्मक असते, आशावादी असते. मरगळलेल्या मनाला उभारी देते, कर्तव्याची जाणीव करून देते. पहाटेच्या प्रहरात विश्वास असतो जे काल झालं नाही ते आज होईल अशी खात्री देतच पहाट उगवते म्हणूनच म्हटले जाते, ” एक दिवस तुझ्याही आयुष्यात पहाट फुटेल”

किंवा “आज स्वातंत्र्याची पहाट उगवली…”

पहाटेत सौभाग्य दडलेलं असतं. या पहाटेत आश्वासकता असते, आवेश असतो, जोश असतो, प्रचंड ऊर्जा असते. मनावरच्या असंख्य बेड्या झुगारण्याची ताकद पहाटेत असते. पहाट मुक्त असते, स्वतंत्र असते. सत्य शिव सुंदराची ओढ लावणारी असते. पहाटेच्या प्रहरात शांत भक्ती रस असतो मन सहजच आध्यात्मिक बनतं. पहाटेच्या प्रहरी म्हणा हरी हरी अशी परमात्म्याची ओढ लागते. सुंदर विचारांचा झरा शरीर प्रवाहतून नकळत वाहतो.

अशी ही नीरव, निरामय, रस गंध नादयुक्त पहाट!

आयुष्याचे नवे गीत गातच उगवते…

 

© राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/सुहास रघुनाथ पंडित /मंजुषा मुळे/गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares