मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ उन्हातल्या चांदण्याचा बहर….भाग 1 स्व. दत्ता हलसगीकर ☆ सौ. ज्योत्स्ना तानवडे

सौ.ज्योत्स्ना तानवडे

 ? मनमंजुषेतून ?

☆ उन्हातल्या चांदण्याचा बहर….भाग 1 स्व दत्ता हलसगीकर ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆ 

 “उन्हातल्या चांदण्याचा बहर” श्री. दत्ता हलसगीकर – भाग १

सामाजिक क्षेत्रात वावरत असताना एक कविता बऱ्याचदा भेटत गेली आणि त्या कवितेने मनात घरच केले. ती कविता होती

ज्यांची बाग फुलून आली

त्यांनी दोन फुले द्यावीत

ज्यांचे सूर जुळून आले

त्यांनी दोन गाणी द्यावीत ||

अशाप्रकारे सामाजिक परिस्थितीची जाणीव करून देणारी ही आशयघन कविता ज्यांची आहे ते आहेत सुप्रसिद्ध कवी श्री गणेश तात्याजी हलसगीकर उर्फ दत्ता हलसगीकर. सात ऑगस्ट १९३४ रोजी जन्मलेले दत्ताजी शेवटपर्यंत सोलापूरला राहत होते. त्यांनी सोलापूरातच लक्ष्मी विष्णू मिलमध्ये वयाच्या साठाव्या वर्षापर्यंत नोकरी केली. त्यांना लिखाणाची आवड होती. किशोर वयापासून अखेरपर्यंत त्यांनी काव्यलेखन आणि ललित लेखन केले.

दत्ताजींच्या वागण्या बोलण्यात साधेपणा, सोशिकता, अगत्य होते तेच त्यांच्या कवितेतून व्यक्त होई. प्रेमळ, निर्मळ, सात्विक असे त्यांचे व्यक्तिमत्व होते.

त्यांच्या काव्यरचना सोप्या, हळुवार,प्रवाही होत्या. त्यांनी आपल्या कवितेतून वंचितांचे दुःख मांडले. गोरगरिबांबद्दल कणव बाळगणारी यांची कविता मनाला भिडणारी, सामूहिक आवाहन करणारी आहे.

त्यांची कविता श्रमिकांपासून  श्रीमंतांपर्यंत भाष्य करताना जास्त खुलून येते. तर श्रमिकांबद्दल जास्तीच हळवी होते. जगण्याचा आनंद कशात आहे, जगणे कसे सुखकर करता येईल हे त्यांनी कवितेतून सांगितले. ‘ उंची ‘या कवितेतून त्यांनी ‘ ज्यांची बाग फुलून आली ‘ अशा देखण्या शब्दात सामाजिक परिस्थितीची जाणीव समाजाला करून दिली.

या कवितेने इतिहास घडवला आहे.२२भाषांमधे तिचे भाषांतर झालेले आहे. आकाशवाणीवरून ही कविता असंख्य वेळा वाचली गेलेली आहे. २०११ साली आकाशवाणीवर झालेल्या राष्ट्रीय कविसंमेलनात दत्ताजींचा सक्रिय सहभाग होता. वाराणसीत झालेल्या सर्वभाषी कविसंमेलनात दत्ताजींनी हीच कविता वाचली होती.

☆ उंची ☆

ज्यांची बाग फुलून आली

त्यांनी दोन फुले द्यावीत

ज्यांचे सूर जुळुन आले

त्यांनी दोन गाणी द्यावीत ||

 

ज्यांच्या अंगणी ढग झूकले

त्यांनी दोन ओंजळ पाणी द्यावे

आपले श्रीमंत हृदय त्यांनी

रीते करून भरून घ्यावे ||

 

सूर्यकुलाशी ज्यांचे नाते

त्यांनी थोडा उजेड द्यावा

युगायुगाचा अंधार जेथे

पहाटेचा गाव न्यावा ||

 

आभाळाएवढी ज्यांची उंची

त्यांनी थोडेसे खाली यावे

मातीत ज्यांचे जन्म मळले

त्यांना उचलून वरती घ्यावे ||

अतिशय तरल शब्दात त्यांनी सामाजिक जाणीवेचा वसा सांगितला आहे. त्यांची कविता समाज वेदनांनी व्यथित होतानाच वात्सल्याने भरून येते. अंधाराचे गाऱ्हाणे मांडताना प्रकाशाचे तोरण लावते.मातीशी इमान राखत आभाळाशी नाते सांगते. त्यामुळे त्यांचे शब्द कधी शीतल, सोज्वळ वाटतात तर कधी फटकारे मारणारे वाटतात.म्हणूनच

एकट्याने किती करावी जाग्रणे

झाडांशी अंगणे दुसऱ्यांची ||

असे परखड बोल ते सुनावतात.याच बरोबरीने

एवढासा अंधार मोठा होत गेला

त्याने सूर्य सुद्धा झाकून टाकला |

विनाशाची एवढीशी निसरडी वाट

एवढ्याशा छिद्राने रिता झाला माठ ||

असे चिरंतन जीवनज्ञानही ते सहजपणे सांगून जातात. एकूणच दत्ताजींची विचारसरणी सकारात्मक, वास्तवदर्शी आहे. कोणत्याही परिस्थितीत निराश न होता जिद्दीने पुढे जायचे हे सांगताना ते म्हणतात,

 मला अजून पहाटेची स्वप्ने पडत आहेत

थोड्याशा अंधाराने मी निराश नाही

अजून मला वसंताची चाहून लागत आहे

थोड्याशा पानझडीने मी हताश नाही ||

अशी त्यांची कविता एकाच वेळी आनंद आणि दुःखाचे प्रेरणादायी अनुभव देते आणि आपल्या मनातही सकारात्मकता जागवते.

क्रमशः ....

© सौ. ज्योत्स्ना तानवडे

सातारा 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ आणि डबा वाजू लागला… ☆ सुश्री स्वरदा केळकर वझे

?  मनमंजुषेतून ?

☆ आणि डबा वाजू लागला… ☆ सुश्री स्वरदा केळकर वझे ☆

त्यादिवशी मीनल कडून आले. घरातली सगळी कामं तशीच पडून होती. मात्र थकव्यामुळे करण्याची उमेद नव्हती. आल्या-आल्या फ्रेश होऊन खाऊन घेतले आणि आता जरा पडावं म्हणून खोलीत आले.

खोलीला लागूनच मोठे ग्राउंड होते. सुट्टीचा दिवस म्हणून सगळी पोरं जमली होती. डबा ऐसपैस चा डाव मोठ्या रंगात आला होता. मी आडवी झाले, मात्र पोरांच्या दंगामस्ती करण्यामुळे आणि डब्याच्या आवाजामुळे झोप लागणे अशक्य होते. कार्ट्यांनी उच्छाद मांडला होता नुसता. जोरात ओरडावंसं वाटलं आणि राग अनावर होऊन मी बाहेर आले. खूप बोलले त्यांना. बिचारी पोरं एवढेसे तोंड करून ग्राउंड वरच बसून राहिली.

घरी आले आणि समाधानाने झोपावं म्हंटलं तर मेली झोपच येईना. सारखी हिरमुसलेली मुलं आणि त्यांचे हिरमोड झालेले चेहरे डोळ्यांसमोर येत राहिले. लहानपणी आपण खेळलेले खेळ, केलेली दंगामस्ती आठवत राहिले. शेजारचे भावे काका ओरडायचे, मग इनामदार आजी समजायच्या, सगळं, सगळं आठवलं.

मग वाटलं, या मुलांचा काय दोष? आलेला थकवा घालवण्यासाठीच तर हि खेळतात, दंगा करतात. आपण मोठी लोक यांच्यावर ओरडतो, कारण आपल्याला थकवा घालवण्यासाठी दुसरा उपाय सापडत नसतो. खरं तर दोष आपला, पण बकरा होतो बिचार्‍या कोवळ्या जिवांचा. ते काही नाही, मुलांवर अन्याय होता कामा नये. त्यांनी खेळलंच पाहिजे.

विचार करत करत उठले, राग तर कुठल्या कुठे पळून गेला होता. झोपही उडाली होती. पटकन गरमागरम थालीपीठ खायला केलं आणि बाहेर बसलेल्या मुलांना अंगणात बोलावलं. साऱ्यांची अंगत-पंगत छान झाली. मुलांची कळी खुलली. त्यांनी दंगा न करता खेळण्याचे कबूल केलं, मात्र मी त्यांना भरपूर दंगा करण्याची परवानगी दिली.

त्या दिवसापासून मुलं रोज खेळू लागली. रोज डबा ऐसपैसचा खेळ रंगत राहिला. खेळातला डबा वाजत राहिला आणि त्याचे पडसाद माझ्या आठवणीतल्या अनुभवांच्या रुपाने उमटू लागले.

© सुश्री स्वरदा केळकर वझे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ दोन मित्रांचा संवाद ☆ श्री मिलिंद जोशी

 ? मनमंजुषेतून ?

☆ दोन मित्रांचा संवाद ☆ श्री मिलिंद जोशी ☆ 

काल बऱ्याच दिवसांनी माझ्या वर्गमित्राचा फोन आला होता. भरपूर गप्पा झाल्या. अनेक जुन्या आठवणींना उजाळा मिळाला तशा अनेक खपल्याही निघाल्या.

“काय म्हणताहेत तुझी मुलंबाळं?” मी नेहमीचा प्रश्न विचारला आणि तो एकाएकी गंभीर झाला.

“यार… बरं झालं तू लग्न केलं नाहीस…” त्याने म्हटले आणि मी चाट पडलो. खरंय ना… जो माणूस ‘मिल्या… तूही उरकून टाक आता… किती दिवस संट्या राहणार?’ असं म्हणायचा त्याच्याकडून असे वाक्य अपेक्षितच नव्हते.

“कारे? काय झालं?” मी थोडं गंभीर होत विचारलं.

“यार… माझा मुलगा मागील वर्षी दहावीला होता. खूप हुशार आहे तो. पण त्याला आमच्या अपेक्षेप्रमाणे मार्क्स मिळाले नाहीत म्हणून त्याची आई त्याला थोडं जास्तच बोलली, तर तो एकदम गप्पंच झाला रे…” त्याने सांगितले.

“म्हणजे?”

“अरे आता तो ना कुणाशी फारसा बोलतो, ना हसतो, ना कोणत्या गोष्टीत समरस होतो. इतकेच काय पण त्याचे कॉलेज अॅडमिशन घ्यायलाही त्याची आई गेली होती. पहिले चार सहा दिवस आम्हाला फारसे काही वाटले नाही. म्हटलं राग आला असेल आईचा तर होईल ४ दिवसात गायब. पण आता दीड दोन महिने होत आले रे… पण त्याच्यात फरकच नाही. आम्ही समजावून बघितले, रागवून बघितले. इतकेच काय पण त्याच्या आईने त्याच्यापुढे हात जोडून माफीही मागितली. पण त्याच्यात काहीच फरक नाही.” मित्राने सांगितले आणि लक्षात आले की प्रकरण खरंच गंभीर आहे.

“तुलाही मी यासाठीच फोन केला. म्हटलं किमान तेवढा वेळ तरी ही गोष्ट मनातून जाईल आणि थोडं हलकं वाटेल.” त्याने म्हटले.

“मन्या… एक सांगू का? राग येणार नसेल तर?”

“काय ते बोल यार… आता राग लोभ या गोष्टींपेक्षा मला माझा मुलगा जास्त महत्वाचा आहे.” त्याने म्हटले.

“तू यासाठी एखाद्या मानसोपचारतज्ञाची मदत घे. त्यांना अशा गोष्टी चांगल्याप्रकारे हाताळता येतात. आणि लक्षात ठेव… मानसोपचारतज्ञाची मदत घेणे म्हणजे तो वेडा झालाय असे समजू नको.” मी सांगितले.

“हं… आता तोच एक पर्याय माझ्या समोर दिसतोय…”

“आणि हो… तुम्ही दोघेही टेंशन घेऊ नका. अजून तरी ही गोष्ट मला खूप गंभीर वाटत नाहीये. पण त्याकडे लक्ष दिले नाही तर मात्र गंभीर होऊ शकते…” मी म्हटले आणि फोन ठेवला.

मनात विचार आला… यार… दहावी तर आपलीही झाली. आईचे बोलणे आणि वडिलांचा मार आपणही खाल्ला, पण कधी आपल्या बाबतीत अशा गोष्टी का झाल्या नसाव्यात? बराच विचार केल्यानंतर लक्षात आले की याचे सगळ्यात मोठे कारण होते ते आपल्या पालकांनी आपल्याशी केलेले वर्तन. कोणती गोष्ट कशी हाताळायची हे त्यांना चांगलेच समजत होते. आजचा किस्सा त्याबद्दलच.

मी दहावीला असताना खूपच व्रात्य होतो. वर्षभर अभ्यासाकडे दुर्लक्ष आणि परीक्षेच्या महिनाभर आधी घोकंपट्टी ही माझी अभ्यासाची पद्धत. त्याचा कितपत उपयोग होणार? त्यामुळेच मी दहावी उद्धरेल असे इतरांनाच काय पण मलाही वाटत नव्हते. पण दहावीचा निकाल लागला आणि मी पास झालो.

संध्याकाळी माझे वडील घरी आले, त्यावेळी मी घराबाहेरच मित्रांशी गप्पा मारत होतो.

“काय रे… आज तुझा निकाल होता ना?” गाडी स्टँडवर लावतानाच त्यांनी प्रश्न केला.

“हो…”

“मग? काय झाले?”

“पास झालो…” मी काहीशा आनंदाने उत्तर दिले.

“छान… किती टक्के?”

“४७.१३%”

“इतके कमी?”

“हो…” माझ्या चेहऱ्यावर थोडी नाराजी आली.

मग बाकी काही न बोलता ते घरात गेले. १० मिनिटांनी आईने मला आवाज दिला. मी घरात गेलो तसे तिने माझ्या हातावर ५० रुपये ठेवले आणि सांगितले… ‘जा… पेढे घेऊन ये…’ मीही हुकुमाची अंमलबजावणी केली. पेढे आणल्यावर आधी देवापुढे ठेवले. नंतर देवाला तसेच आईवडिलांना नमस्कार केला, त्यांच्या हातात पेढा ठेवला आणि एक पेढा तोंडात टाकला.

“जा आता… बाकी पेढे कॉलेनीत वाटून ये…” आईने सांगितले. मी हातात पेढ्यांचा बॉक्स घेतला आणि वाटायला बाहेर पडलो.

“हे घ्या पेढे?” मी पहिल्याच घरात जाऊन म्हटले.

“अरे वा… पास झाला वाटतं?” त्या घरातील मावशींनी प्रश्न केला.

“हो… झालो ना…” मीही आनंदाने सांगितले.

“छान… किती टक्के?” पुढचा प्रश्न.

“४७.१३%” मी उत्तर दिले.

“फक्त? आणि तरीही पेढे वाटतोस?” त्यांनी म्हटले आणि मला अपमान झाल्यासारखे वाटले. मी तिथून काहीही न बोलता बाहेर पडलो. पुढील ३/४ घरातही मला असाच काहीसा अनुभव आला. शेवटी इतर ठिकाणी न जाता मी घरी आलो.

“इतक्या लवकर झाले पेढे वाटून?” आईने विचारले पण मी काहीच उत्तर दिले नाही, फक्त पेढ्यांचा बॉक्स आईच्या हातात दिला.

“अरे… यात तर पेढे आहेत अजून?” तिने बॉक्स उघडत म्हटले.

“हो… फक्त चार ठिकाणीच गेलो होतो…” मी काहीसे नाराजीने उत्तर दिले.

“का?” तिने विचारले आणि मी कोण काय म्हणाले हे सगळे सांगितले.

“अस्सं… ठीक आहे… पण आता बाकीच्या ठिकाणीही जाऊन ये. कुणी जर कमी मार्कांबद्दल काही म्हटले तर त्यांना सांगायचे… ‘यावेळी अभ्यास कमी पडला पण पुढील वेळी अजून प्रयत्न करेन…’ आणि हो… कुणालाही चिडून काही बोलू नको…” तिने सांगितले आणि मी त्याप्रमाणे उरलेल्या ठिकाणीही पेढे वाटून आलो.

घरी आलो त्यावेळी शेजारच्या आक्का घरी आलेल्या होत्या.

“काय रे… आला का सगळ्यांना पेढे वाटून?” आईने विचारले.

“हो… आलो…” मी म्हटले.

“मीरा… मिलिंदला इतके कमी मार्क मिळाले तरी तू त्याला पेढे वाटायला का पाठवलेस?” माझ्या देखतच आक्कांनी आईला विचारले.

“त्याला जीवनाचे धडे मिळावेत म्हणून…” आईने उत्तर दिले आणि मी विचार करू लागलो… यार… पेढे वाटणे यात कसला आलाय जीवनाचा धडा?

“म्हणजे?” माझ्याप्रमाणेच आक्काही विचारात पडलेल्या मला दिसल्या.

“अहो… तो पास झाला म्हणजेच त्याला यश मिळाले आहे. आणि जीवनात आनंदी राहायचे असेल तर अगदी क्षुल्लक यशही साजरे करता आले पाहिजे, म्हणून आम्ही पेढे आणले. त्यानंतर त्याला ते घेऊन लोकांकडे पाठवले. तिथे अनेकांनी त्याला विचारले ‘इतके कमी मार्क का?’ यातून त्याला हे समजेल की लोकांना यशापेक्षा जास्त अपयश दिसते आणि त्यालाच लोक अधोरेखित करतात. ज्यावेळी तो अशा गोष्टीने उदास होऊन घरी आला, मी त्याला अशा लोकांना काय उत्तर द्यायचे हे सांगून परत पाठवले. यातून तो हे शिकू शकेल की ज्यावेळी लोक आपला अपमान करतात किंवा आपल्याला कमी लेखतात त्यावेळी चिडून किंवा दुःखी होऊन समस्येपासून पळण्याऐवजी शांत राहून त्याचा सामना केला पाहिजे. बरे त्याला एकट्यालाच यासाठी पाठवले कारण त्याला हे माहित व्हावे की त्याने केलेल्या चुकांसाठी त्यालाच उत्तर द्यावे लागणार. पण त्याच बरोबर ‘काय उत्तर द्यायचे’ हे सांगून हेही दाखवले की ‘तो एकटा नाही, आम्ही कायम त्याच्या पाठीशी उभे आहोत.’ आणि सगळ्यात महत्वाचे… परीक्षा होऊन गेली आहे. निकालही हाती आला आहे. तो बदलणे कदापि शक्य नाही. मग चिडून किंवा दुःख करून काही उपयोग आहे का? नाहीच ना… त्यापेक्षा आहे त्या परिस्थितीचा स्वीकार करून पुढे जाणेच जास्त योग्य… पुढील वेळी तो नक्कीच जास्त मेहनत घेईल.” आईने सांगितले.

“मीरा… आता मात्र तू शिक्षिका होतीस या गोष्टीवर माझा पूर्ण विश्वास बसला…” आक्कांनी हसत म्हटले आणि आई देखील त्यांच्या हसण्यात सामील झाली.

खरे तर प्रसंग एकदम साधा होता. पण तो कायमसाठी माझ्या मनावर कोरला गेला. त्यानंतर अनेकदा अपयश आले, अनेकांनी दुषणे देऊन तर कधी अपमान करून माझे मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला. पण अजूनपर्यंत तरी माझे मानसिक स्वास्थ्य बिघडल्याचे मला स्मरत नाही… आणि यापुढेही ते असेच टिकून राहील अशी अपेक्षा आहे.

– मानसिक स्वास्थ्य टिकविलेला नाशिककर, मिलिंद जोशी.

©️ मिलिंद जोशी

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

 

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ रेस्टींग पिरियड…… नात्यांमधला !!! ☆ सुश्री स्वाती देव

? मनमंजुषेतून ?

☆ रेस्टींग पिरियड…… नात्यांमधला !!! ☆ सुश्री स्वाती देव ☆

बागकाम हा माझा ठआवडता छंद असल्यामुळे बागकामाचे व्हिडिओ बघत होते. अनेक plants ची माहिती करून घेत होते. त्यांच्या वाढीविषयी किंवा त्यांच्या संगोपना विषयी माहिती वाचताना एक शब्द बऱ्याच वेळा येत होता. तो म्हणजे रेस्टींग पिरियड. साधारणतः हिवाळ्यामध्ये त्यांचा रेस्टिंग पिरियड असतो. त्या कालावधीमध्ये खत अजिबात घालायचं नसत, पाणी कमीत कमी देतात. काही काही झाडांच तर हार्ड प्रूनिंग किंवा कटिंग करून टाकतात. सगळी पाने काढून टाकतात. म्हणजे बर्‍यापैकी हार्श ट्रिटमेंट त्यांना दिली जाते असे मला वाचताना वाटले. म्हणजे एखाद्याला झाडांबद्दलची ही पुरेशी माहिती नसेल तर झाडांचे बहरणे बंद झाल्यावर तो सोसासोसाने त्याला खतपाणी घालत बसेल, उन्हातली कुंडी सावलीत ठेवेल, सावलीतली ऊन्हात ठेवून बघेल आणि तरी शेवटी फुलं येत नाही म्हणून दुःख करत बसेल. पण या हक्काच्या रेस्टिंग पिरियडनंतर ज्या जोमाने झाडं बहरतात हे वाचल्यानंतर मनात एकदम विचार येऊन गेला की नात्यांच पण असंच असतं का ?

नात्यांना आपण मायेचं, प्रेमाचं, विश्वासाचं खतपाणी घालत असतो आणि ती हळूहळू बहरतात पण कधीकधी या गोष्टींचा समतोल बिघडतो. कधी जास्त गृहीत धरल जातं, कधी अति काळजी केली जाते, कधी हक्क दाखवला जातो. काय आणि कसं पण हे नातें हळु हळू नाजूक, कमकुवत व्हायला लागत. मग अचानक कधीतरी छोटीशी वाटणारी कृती किंवा अजाणतेपणी गेलेला एखादा शब्द हे पुरेसं ठरतं आणि ते नातं एकदम शॉक मध्ये जातं. मग अशा वेळेस हा चक्क नात्यांमधला रेस्टिंग पिरियड आहे असं मानायला काय हरकत आहे ? मग अशावेळी जाणीपूर्वक संवाद थोडा कमी झाला तरी हरकत नाही, वारंवार भेटणं व्हायला पाहिजेच असं नाही, गरजेपुरताच संवाद झाला तरी काही बिघडत नाही. नेमकं काय चुकलं असेल याचा विचार करून, योग्य तो बोध घेऊन, आपण स्वतः चुकलो असलो तर आपल्याला स्वतःला सुद्धा माफ करून शांत राहावे. अगदीच तशी गरज पडलीच तर आपण आहोतच एकमेकांना एवढा विश्वास पुरेसा आहे. कालांतराने मन किंवा नाती पुन्हा जुळतील याबद्दल मला तरी खात्री वाटते.

मात्र कधीकधी बसणारा शॉक हा मोठा असतो. नुकत्याच आमच्या गच्चीमध्ये माळीबुवांकडून सगळ्या कुंड्या repoting करून घेतल्या. पूर्ण झाडं काढून त्याची मुळांची छाटणी करून ती गरजेनुसार मोठ्या कुंड्यांमध्ये लावली. काही काही झाडांना पालवी फुटायला सुरुवात पण झाली पण काही झाडं मात्र ढिम्मच. त्यांच्यात जिवंतपणाची काही लक्षणे दिसत नव्हती. मला चाळाच लागला होता रोज एकदा त्या वाळलेल्या झाडांकडे जाऊन निरीक्षण करायचं कुठे जिवंतपणाची निशाणी दिसतेय का ते. दोन तीन झाडांची तर मी आशाच सोडून दिली होती पण आता सीझन बदलल्यानंतर अचानक मला त्यांच्यावर इवलिशी फूट दिसायला लागली. ज्या झाडांची मी आशा सोडून दिली होती त्या प्रत्येकाला पालवी फुटलेली आहे. थोडक्यात नात्यात सुध्दा शॉक मोठा असेल तर वेळ पण जास्त लागेल पण ते पूर्ववत मात्र नक्की होईल असा विश्वास वाटतो.

एवढं सगळ असलं तरी जसं आपण अमरपट्टा घेऊन आलो नाहीये तशी काही नाती सुद्धा अमरपट्टा घेऊन आलेली नसतात, त्यांचीही एक्सपायरी डेट असतेच की. त्यांचा सुद्धा मृत्यू होतो. तसं झालंच तर मग त्या वेळेस मात्र तोही शांतपणे स्वीकारावा.

हे सगळे माझ्या स्वतःच्या अनुभवातून मनामध्ये उठणारे तरंग आहेत. निसर्ग आणि माझं अचपळ मन यात मला कुठेतरी संगती दिसली, ती शब्दांत उतरवली….

 

© सुश्री स्वाती देव

+91 98509 72526

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ जागतिक अंध दिवस निमित्त – डोळस…. ☆ श्री सुनीत गोधपुरे

? मनमंजुषेतून ?

☆ जागतिक अंध दिवस निमित्त – डोळस…. ☆ श्री सुनीत गोधपुरे ☆

तो अंध तरुण रोज काॕर्पोरेशनच्या त्या बसस्टाॕपवर उभा असतो.

मी ज्या वारजेमाळवाडी  बसमधे चढतो, तोही त्याच बसमधे चढतो. मी वारजे जुन्या जकात नाक्याला माझ्या आॕफीसशी उतरतो अन तो अजून तसाच पुढे माळवाडीला जातो. त्याच्या पाठीवर जी सॕक सदृश्य बॕग असते त्यावर फिक्कट पुसट अक्षरे दिसतात ‘जीवन प्रकाश अंध शाळा, माळवाडी’. गर्दीमुळे ब-याच वेळेला बसायला जागा मिळत नाही तेंव्हा काही सुजाण लोक त्याला बसायला जागा देतात, तेंव्हा तो विनम्रपणे नकार देतो. कोथरुड स्टँडच्या आसपास गाडी ब-यापैकी रिकामी होते तेंव्हा आम्हाला बसायला जागा मिळते. माझा स्टाॕप त्यानंतर  लगेच असल्याने मी पुढे जाउन बसतो व उतरुन जातो. बसबरोबर त्या तरुणाची आठवण दुस-या दिवसापर्यंत पुढे निघून जाते.

त्या दिवशी योगायोगाने आम्ही नळस्टाॕपला एका सिटवर बसतो. ब-याच  दिवसांचे कुतुहल असल्याने मी त्याला विचारतो..

‘तुम्ही रोज बस ला दिसता..पुढे माळवाडीला जाता..स्टुडंट आहात का?’

अचानक मी विचारलेल्या प्रश्नाने तो आधी चमकतो. मग उत्तर देतो.

‘सर, मी विद्यार्थी नाही मी शिकवतो..’

‘ओ अच्छा..ब्रेल वाचायला वगैरे शिकवता का मुलांना?’ मी विचारतो.

तो हसतो..मग उत्तरतो ’नाही सर. मी ज्या मुलांना शिकवतो ती ब्रेल मधले मास्टर आहेत. मी त्यांना कम्प्यूटर ब्रेल कोड शिकवतो..आम्ही अंध व्यक्तींना उपयुक्त ब्रेल साॕफ्टवेअर डेव्हलप करण्यासाठी लागणारी कोड्स तिथल्या मुलांना शिकवतो. ही मुले पुढे ब्रेल प्रोग्रामर होतील ’

माझ्यासाठी हे नवीनच होतं..मी उत्सुकतेने त्याला विचारतो.. ‘अरे वा म्हणजे दिवसभर तुम्ही तिकडेच शिकवायला असता?’

पुन्हा मला खोडून काढत तो म्हणतो

‘नाही मी दुपारी परत येतो..डेक्कनला आमच्या कंपनीत..तिथे आम्ही काही स्पेशल प्रोजेक्टस वर काम करतो’

मी चिकाटीने पुन्हा त्याला विचारतो ‘म्हणजे ब्रेल प्रोग्रामिंग वगैरे?’

पुन्हा एकदा नकारार्थी मान हलवत  तो म्हणातो ‘आम्ही जे करतो त्याला एथिकल हॕकींग म्हणतात..तुम्ही त्याबद्दल ऐकले असेल’

आता थक्क होण्याची वेळ माझ्यावर वर आली असते.

‘माय गाॕड..पण एथिकल हॕकिंग साठी लागणारे सिस्टीम्स..सर्व सुविधा…?’

‘आमच्याकडे आहेत..’  तो पटकन म्हणतो, ‘आता विषय निघालाय म्हणून सांगतो. आपल्या देशात ज्या  सरकारी वेबसाईट्स आहेत त्यांचे सतत हॕकिंग होत राहते..ते काम  देशविरोधी गृप्स करत राहतात. आम्ही अशा हॕकर्स ना कसा प्रतिबंध करता येइल यासाठी नॕशनल इन्फाॕर्मटीक्स सेंटर म्हणजे NIC बरोबर मिळून काम करतो.  आम्ही चार अंध मित्र आहोत..आम्ही या लोकांना लोकेट करतो..आम्ही हे काम NIC बरोबर मिळून करतो कारण NIC या सर्व सरकारी वेबसाईट्स होस्ट करते व त्यांच्या सुरक्षेची काळजी घेते. या सर्व अज्ञात शक्तींना प्रातिबंध करण्यासाठी आम्हाला आम्हा अंध लोकांमधे जन्मजात असलेले Intuition कामाला येते..’ तो हसत म्हणतो.

तो तरुण जे सांगत असतो त्याने मी अवाकच होतो. हा तरुणसवदा मुलगा जे एवढ्या सहजताने सांगत आहे ते करणे सोपे नसते. मी स्वतः माझी छोटीशी आय टी कंपनी चालवत असल्याने हे सारे किती अवघड आहे हे मला ठाउक असते. तरीही न राहवून मी त्याला शेवटचं विचारतो,

‘फक्त या कामावर तुम्ही व तुमची कंपनी चालते..?’

‘नाही सर..!’ तो उत्तरतो ‘ आम्ही ब्रेल कम्प्युटींग व एथिकल हॕकींग साठी काही अल्गोरिधम वर ही बरंच काम करतोय की जेणे करुन हे काम आमच्या इतर अंध बांधवापर्यंत आम्हाला पोचवता येइल.आमचं काम प्रत्यक्ष NIC चे हेड आॕफीस हँडल करतं..काम खूप सिक्रेटीव्ह असल्याने यापेक्षा जास्त सांगता येत नाही.’

तो हसतो व म्हणतो ‘बाय द वे तुमचा स्टाॕप आलाय..’

मी पाहतो तर खरोखरच माझा स्टाॕप आलेला असतो.

‘अरेच्चा..’ मी विचारतो..’ तुम्हाला कसे कळाले माझा स्टाॕप आलाय?’

‘सर तुम्ही तिकीट घेतला तेंव्हा मी तुमचा स्टाॕप ऐकला..माझ्या डोक्यातही एक प्रोग्राम देवाने आपलोड केलाय..Travelled Distance Analysis चा..पण  त्याबद्दल पुन्हा कधीतरी सांगेन..गुड डे सर!’

तो मला हसत म्हणतो.

बसमधूनन उतरतो व स्तंभित होउन ती नाहीशी होइपर्यंत मी फक्त पहात राहतो. खरे सांगू? आपल्या आंधळ्या दुनियेत आज मला एक डोळस माणूस भेटलेला असतो.. त्याच्या प्रखर प्रकाशात मी अक्षरशः दिपून जातो.

 

© श्री सुनील गोबुरे

सांगली

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ काला….. ☆ सौ. सुचित्रा पवार

सौ.सुचित्रा पवार

? मनमंजुषा ?

☆ काला…..☆ सौ. सुचित्रा पवार ☆

‘काला ‘ म्हणलं की डोळ्यांपुढं काय उभं राहतं ? लहान बाळाने पाटीवर किंवा वहीवर उभ्या आडव्या किंवा गोल गोल रेघोट्या ओढून केलेला  गीजबीट काला की लहानपणी खाल्लेला आमटी भाकरीचा काला ? बऱ्याच जणांना हाच काला आठवला असणार! कारण या काल्याची चव जिभेवर तशीच रेंगाळत असणार! काला —भाकरी कुस्करून भिजेल इतपतच दूध किंवा आमटी घालून बनवलेला एकजीव लगदा ! जो पातळही नसतो आणि अगदी तोटरे लागेपर्यंत घट्टही.

लहानपणी मधल्या सुट्टीत जेवणाचे डबे फक्त ज्यांची घरे लांब आहेत किंवा शेतातल्या वस्तीवरून येणाऱ्या मुलं मुलीच आणत. ज्यांची घरे जवळ आहेत ते घरीच येऊन जेवत. कमी वेळेत पोटभर जेवण खायचा चविष्ट, साधा सोपा मार्ग म्हणजे भाकरीचा काला करणे. शक्यतो डाळीची किंवा कडधान्याचीच आमटी असायची. भाजी हा प्रकार फक्त कधीतरी हिरवी पालेभाजीच, इतरवेळी आमटीच. सकाळी भात ही त्याकाळी करत नसत. सकाळी लवकर उठून स्वयंपाक करून ठेवून शेतावर कामासाठी किंवा मजुरीसाठी जायला लागायचे त्यामुळं मधल्या सुट्टीपर्यंत बुट्टीतली भाकरी थोडीशी वाळून गेलेली असायची अगदी मऊसूत नसायची म्हणून त्यावर शोधलेला नामी उपाय म्हणजे काला ! भाकरी कुस्करून (चुरून शब्द खूप मिळमिळीत)एका ताटलीत घ्यायची मग त्यात पळी दोन पळी आमटी घालायची आणि पूर्ण चुरा कालवला म्हणजे भाकरीच्या अणू -रेणूत आमटी एकरूप व्हायची मग ते छोटे छोटे घासाचे गोळे करून खायचे,अहाहा ! किती चविष्ट लागायचा तो काला ! आणि पोट भरल्याचे समाधानही ! (मटणाचा रस्सा अन शिळ्या भाकरीचा काला तर अवर्णनीयच!)

शेतावर जाताना फडक्यात बांधलेली भाकरी कालवणात भिजून जायची; तो भिजलेला काला भुकेल्या पोटी खाताना अमृताहून रुचकर लागायचा. पूर्वी डबे वगैरे असला काही प्रकार नसायचा. सरळ फडक्यात खाली दोन भाकरी, वर दोन भाकरी आणि मधल्या भाकरीवर कालवण. ही मधली भाकरी कालवणातल्या थोड्याश्या ओलसर पणाने भिजून जायची आणि तिचा मऊ काला व्हायचा. भुकेल्या पोटी हा काला खाताना होणारा क्षुधापूर्तीचा आनंद अवर्णनीयच !

म्हाताऱ्या माणसाना दात नसल्याने काल्याशिवाय पर्याय नसतो. कोणताही पदार्थ पातळ केला की पचायला सोपा होतो हेच तर शास्त्र नसेल ना काला करण्यामागचे?

खरे तर श्री कृष्णाने काल्याची सुरुवात केली असावी असे मला वाटते.

यमुनेच्या तीरी

जमवून गोपाळाना

करुनी गोपाळकाला

सुखावतो सवंगड्यांना

रानात गाई चरावयला नेल्यानंतर दुपारच्या वेळी गुरे सावलीत विश्रांती घेत आणि कृष्ण आपल्या सवंगड्यांना जमवून शिदोरी सोडत असे आणि सर्वांच्या शिदोऱ्या एकत्र करून खात. गोपाळ काला तेव्हापासूनच समाजमान्य आणि समाजप्रिय झाला; कारण हा काला सामाजिक समतेचे प्रतीक होते. वेगवेगळ्या सामाजिक आणि आर्थिक पार्श्वभूमीचे हे बालगोपाल एकत्र जेवताना कुणालाच अवघडलेपण येऊ नये, सर्वजण एकत्र असताना कुणी स्वतःचे वेगळेपण जपू नये ,त्याचबरोबर अन्न हे जिभेसाठी नसून पोटासाठी, क्षुधा शमवण्यासाठी असते हाच संदेश कृष्णाने गोपाळ काला करून दिला. दही भाताचा काला कृष्णाला जसा प्रिय तसाच अनेक देवदेवतांना प्रिय आहे. भात, दही, साखर वरून तुपाची धार सोडलेला दही भाताचा काला शंकराला प्रिय आहे.खरे तर जे अन्न पौष्टिक आणि आरोग्यदायी आहे तेच देवाला प्रिय आहे आणि तेच आपण देवाला नैवेद्यात वापरतो.

ताजा थंड झालेला मऊ भात ,त्यात मावेल इतपतच दही(फार पिचपीचीत न करता)चवीपुरती साखर घालून एकजीव काल वलेला दहिभाताचा अमृततुल्य काला लहान मुलांसाठी पौष्टिक आहे .क्षुधा शांत होते,जठराग्नी शमतो आणि बल देणारा हा काला देवालाही न आवडला तर नवलच.

“दही भाताचा घ्या काला आमचा कूळस्वामी(ज्याचा जो कुलस्वामी असेल त्याचं नाव घयायचे) पारधीला गेला.”

पौष पौर्णिमेला  दही-भात ,गाजराचे तुकडे ,कांदा पात, हिरवा ओला हरभरा एकत्र मिसळून  काला करायचा,त्याचे शंकू सारखे मूद करून देवाला नैवेद्य दाखवून संध्याकाळी ताटात मूद ठेवून शेजारी पाजारी एक एक मूद वाटायची आणि त्यांनी ताटात त्याबदल्यात शिळी चतकोर-अर्धी भाकरी ठेवायची.माघारी आल्यावर ती शिळी भाकरी आपण खायची. शिळीच भाकरी का द्यायची?मला कारण समजले नाही पण अन्न शिळ की ताज असो त्याचा अव्हेर/अपमान करायचा नाही, असा संदेश असेल. त्या जमलेल्या भाकरी घरी येऊन खायच्या.आता कुणी मूद वाटत नाही.याच पौर्णिमेला मूदीची पुनीव म्हणतात.

नुकतेच जेवण घेऊ लागलेल्या बाळाला दही-भात, वरण भात, दूधभात किंवा दुधभाकरी, वरण भाकरी चा काला भरवतात. नुकतेच दात येऊ लागलेले असतात त्यामुळं त्याला घास चावणे व पचणे सोपे जावे व पोटही भरावे म्हणून बाळाला काला भरवतात.वृद्ध व्यक्तीही दात नसतात म्हणून काला खाणेच पसंद करतात. शेतकरी लोक गडबडीत जेवण उरकण्यासाठी आमटी भाकरीचा काला खाणेच पसंद करतात.

पारायणाची सांगता काल्याच्या किर्तनाने होते. काला सामाजिक समतेचे प्रतीकच आहे जणू. भिन्न आर्थिक स्तरातील समाज एकसंघ राहण्यासाठी स्वतःचे वेगळेपण बाजूला ठेवून, ‘स्व’ विसरून एकमेकांत मिसळणे गरजेचे असते कारण एकत्र रहाताना वेगळेपण जपायचे नसते त्याला ‘अहं’ची बाधा होते.म्हणूनच कृष्णाने गोपाळ काल्याची संकल्पना सुरू केली ..अवघा रंग एक झाला..’पंढरपुरात हरी कीर्तनात,हरी भजनात तल्लीन होताना भेद आपोआप गळून सगळेच रंग एक होऊन हरीमय होतात.भेदाभेदाला तिथं मुळीच स्थान नसते किंबहुना भेदाभेद पाळणारा हरीमय होऊ शकत नाही.लहान मोठा ,गरीब श्रीमंत ,उच नीच सगळेच चंद्रभागेच्या वाळवंटात एक होतात.

आज सामाजिक परस्थिती खूपच  बदलली आहे.काला खाणे कालबाह्य झालेय आणि एकाच घरातल्या माणसांचे वेगवेगळे रंग एकरंग होणे अवघड झालेय कारण हेच, आम्हाला एकमेकांत कालवून घ्यायचे नाही!   निकोप ,सुदृढ शरीरासाठी आणि समाजासाठी पुन्हा काल्याचे स्मरण होण्याची खरेच गरज आहे,तुम्हाला काय वाटते ?

तुम्हीही खाल्लाय का कधी काला?एकदा जरूर खा अन ब्रह्मानंदी टाळी लागू द्याच!!

 

© सौ.सुचित्रा पवार

10/3/21

तासगाव, सांगली

8055690240

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ वादळ – (तौक्ते) च्या निमित्ताने ☆ सुश्री मंजिरी दातार

? मनमंजुषेतून ?

☆ वादळ – (तौक्ते) च्या निमित्ताने ☆ सुश्री मंजिरी दातार☆ 

मी लग्न होऊन ओरीसात गेले, ओरीसा म्हणजे बरंचसं आपल्या कोकणासारखं वाटलं….सुंदर निसर्ग….आणि आमच्या गावात तर समुद्र. कॉलनीच्या मागे ‘महानदी’ होती. मी इतकी हरखून गेले होते, कॉलनी पाहून…एकूणच तो नविन प्रदेश पाहून….पण आता जितके फायदे तितकेच तोटे पण असणारच.

ओरीसा म्हणजे दरवर्षी cyclone ठरलेलं….छोटं, मोठं….पण वर्षातून एकदा दोनदा तरी वॉर्निंग यायचीच….मग cyclone नाही आलं तर मोकळा श्वास सोडायचा….आलं तर परत पुढचं येईस्तोवर राज्य पडत झडत उभं राहायचं.

माझं लग्न झालं त्याआधी १९९९ ला ओरीसानी super cyclone बघितलं होतं…..त्यामुळे प्रचंड दहशत होती लोकांच्या मनात….नंतर २००२ मधे cyclone ची वॉर्निंग आली. माझ्या साठी हा पहिलाच अनुभव होता…..प्रदिप नी, माझ्या मिस्टरांनी मात्र १९९९ चं cyclone बघितलं होतं.

मला प्रदिप नी सांगितलं, तू जरा सामान भरुन ठेवशिल का? कारण cyclone येईल मग पंचाईत होईल…..म्हटलं चालेल. तर म्हणाले….क्षिप्रा भाभी बरोबर जा दुकानात…तर म्हटलं का…मी जाईन….तर म्हणाले नको तिला बरोबर ने….म्हटलं ठिक.

क्षिप्रा अगदी माझ्या बाजुच्या फ्लॅट मधे रहायची,बंगाली होती….मी आल्यापासून सगळ्यात खूप मदत केली तिने….( ती बंगाली असल्यामुळे आम्ही हिंदीत बोलायचो….पण आता मी सगळं मराठीत लिहितेय) प्रदिप गेल्यावर मी तिला विचारलं की जाऊया का….तर म्हणाली हो चालेल, तासाभरानी जाऊया…..पण एक काम कर, दोन्ही वेळचा स्वैपाक आटपून घे मग जाऊया. मग आम्ही दोघी गेलो दुकानात….मी दुकानदाराला म्हटलं, ही लिस्ट….भाभी म्हणाली मला दाखव लिस्ट….त्यात तांदुळ, डाळ, आटा, तेल असं काय काय होतं….तिनी माझ्या कडे बघितलं म्हणाली ही लिस्ट परत पर्स मधे टाक….मला कळेना असं का म्हणतेय ती.

मग दुकानदाराला तिनी माझ्यासाठी सामान सांगितलं, १५ अंडी, २ ब्रेड चे मोठे पुडे, १०/१२ चिप्सची पाकीटं, २/४ हल्दीराम सारखे काही चिवडा, मिक्चर वगैरे, जॅम, ८/१० बिस्किटाचे पुडे….आणि तो डिप डिप वाला चहा….पहिल्यांदा घेतला मी आयुष्यात….आणि ४ लिटर दुध. मी तिला म्हटलं माझा दुधवाला येवून गेलाय, तर म्हणाली पुढचे २/४ दिवस कदाचित नाही येणार.

मग तिनी पण असंच सामान तिच्यासाठी घेतलं….आणि आम्ही निघालो, परत येतांना मी तिला म्हटलं हे सगळं मला महिनाभर पुरेल….तर म्हणाली ते तेव्हा,जेव्हा तुम्ही बाकी काही जेवता तेव्हा….एकदा वारं सुरु झालं ना की गॅस पेटणार नाहीये….हे जे घेतलंय हेच लंच, डिनर, ब्रेकफास्ट असणार आहे. आता घरी जाऊन, दुध तापवून,  अंडी उकडून फ्रिज मधे ठेव….आपल्याला जी electric शेगडी दिली आहे ना घरात ती अश्या वेळी वापरायची….अर्थात जोपर्यंत वीज आहे तोपर्यत…..आम्ही तिथे रोजचं पाणी उकळून प्यायचो…..तेव्हा तिनी पाणी पण ८/१० लिटर उकळून ठेवायला सांगितलं….कारण वीज गेली, की नंतर पाणी पण जाणार.

ती मला म्हणाली स्वैपाक झालाय ना आजचा….आता घरी जाऊन तुला ही सगळी तयारी करायची आहे…..वापरायचं पाणी भरुन ठेव.

मला खूप टेंशन आलं होतं…मी म्हटलं इतकं काही होईल? तर म्हणाली नाही झालं तर बेस्ट पण तयारी हवी…..आम्ही बिल्डिंग शी आलो तर बरेच लोक तळमजल्यावरच्या फ्लॅट्स मधे दिसत होते….मी म्हटलं हे काय झालंय….तर म्हणाली चल दाखवते….मग खाली एक मैत्रिण रहायची तिच्या घरात गेलो…..तर टिव्ही बांधून ठेवला होता….दोरीनी….आत मधे फ्रिज साठी एक तात्पुरता लाकडाचा उंच पाट करुन त्यावर चढवला होता…..त्याला बांधण्याचं काम सुरु होतं…..कंपनीची लोकं येवून हे करुन देत होते…..कारण वारं सुटलं…वादळ आलं की ‘महानदी’ कॉलनीत येणार….आणि जे हवं ते बरोबर घेवून जाणार….म्हणून शक्य तितकी काळजी घेणं सुरु होतं.

आम्ही दोघी दुसऱ्या मजल्यावर रहायचो….पाण्याची भिती आम्हाला नव्हती….आम्हाला वाऱ्याची भिती होती.

मग क्षिप्रा नी सांगितलं…..आता खाण्यापिण्याचं झालं की घर जे सजवलं आहेस ते काढून बॅग भरुन ठेवून द्यायची…..कपडे सगळे आवरुन ठेव….जितकं कमी सामान बाहेर राहील तितकं चांगलं…..त्याप्रमाणे मी सगळं घर आवरलं.

संध्याकाळ पर्यंत वातावरण कुंद झालं होतं….वारं पण फार नव्हतं…..पण नेहमीपेक्षा जास्त होतं. रात्री प्रदिप ला सगळं सांगितलं सकाळी काय झालं….तो म्हणाला म्हणूनच म्हटलं होतं की भाभी बरोबर जा.

दुसरा दिवस उजाडला, ते एकदम विचित्र वातावरण घेऊनच….वारं पूर्ण पडलं होतं, पाऊस अगदी बारीक होता…..मला वाटलं झालं वाटतं सगळं शांत….प्रदिप तयारी करत होता ऑफिसची….मी म्हटलं सगळं शांत झालं ना….तर फक्त हम्म म्हणाला….पण निघतांना म्हणाला, be brave…काही वाटलं तर क्षिप्रा भाभीला फोन कर….अर्थात फोन सुरु असले तर (हे पण जोडलं त्यानी पुढे) मला फोन केलास तर चालेल पण मी येवू शकेन की नाही सांगता येत नाही, भाभी च मदत करेल.

प्रदिप गेल्यावर भाभी आलीच बघायला,सगळं नीट आहे ना….मी म्हटलं ये चहा पिऊ तर म्हणाली मी घर बघू का तुझं सगळं….म्हटलं बघ की.

तिला मी म्हटलं शांत झालंय ना सगळं….गेलं का वादळ? तर म्हणाली तू वादळापुर्वीची शांतता असा शब्द ऐकला आहेस? हे ते आहे….संध्याकाळी वारं सुरु होईल.

मग मी चहा करेस्तोवर तिनी घर बघितलं….एक दोन वस्तू तिला हव्या तश्या हलवल्या. मग मला तिनी बेडरुम मधे बोलावलं….आमच्या बेडरुम मधे भितींत एका खाली एक असे मोठे कोनाडे केलेले होते…..उघडेच होते, दारं नव्हती त्याला….ते इतके मोठे होते की सगळ्यात खालच्या खणात मी सुटकेस ठेवायची….ती तिथेच उघडायची सुध्दा….तेव्हा तिथे सगळी पेपर ची रद्दी होती माझी ठेवलेली…..भाभी म्हणाली ती काढून घे आणि वर ठेव….म्हटलं ओके….पुढे म्हणाली वारं वाढलं दार, खिडक्या तुटायला लागल्या तर या खणात येवून लपून बसायचं….ही जागा सगळ्यात सेफ आहे. माझ्या अंगावर सरसरुन काटा आला.

संध्याकाळी खरंच सोसाट्याचं वारं सुरु झालं, खिडकी दारं वाजायला लागले…..पाऊस सुरु झाला….निसर्गाचं रौद्र रुप त्या रात्री अनुभवलं….प्रदिप ऑफिस मधेच होता….भाभी शी मी फोनवरच बोलत होते….मग लाईट गेलीच….महानदी आलीच कॉलनीत…..मग खालच्या मजल्यावरचे लोकं वरती आमच्याकडे आले……तेवढंच दुःखात सुख की मी आता घरात एकटी नव्हते…१/२ दोघी मैत्रिणी होत्या. कारण बहूतेक सगळे पुरुष प्लांट मधेच होते…..पूर्ण रात्र जागून काढली….प्रयत्न करुनही झोप लागणं शक्यच नव्हतं…..१९९९ च्या वादळानंतर जास्त पक्की दारं, खिडक्या बसवल्या होत्या त्यामुळे दारं तुटली नाहीत….खिडक्यांच्या काचा मात्र फुटल्या….त्यातून प्रचंड पाऊस आत येत होता….पण आमचा हॉल सेफ होता….सगळ्या खोल्यांची दारं बंद करुन आम्ही रात्र हॉल मधे काढली……मध्यरात्री landfall झाला…..आणि दुसरा दिवस उजाडला…..पुढे अजून एक दोन दिवस वारं, पाऊस होताच. नंतर झालेली हानी बघवत नव्हती….तळमजल्यावर सुध्दा लोकांच्या घरात गेलेलं पाणी काढणं, सामान आवरणं कठिण झालं होतं.

निसर्गापुढे आपण किती थिटे पडतो याचा अनुभव त्यावर्षी घेतला. मग पुढच्या ३ वर्षात असे बरेच छोटे मोठे cyclone ओरीसात अनुभवले पण हा पहिला अनुभव मात्र काळजावर कोरल्या गेलाय.

© सुश्री मंजिरी दातार

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ देवनागरी ☆ श्री मयुरेश गद्रे

? मनमंजुषेतून ?

☆ देवनागरी ☆ श्री मयुरेश गद्रे ☆ 

आजच्या लोकसत्ताच्या लोकरंग पुरवणीमध्ये सुभाष अवचटांचा “देऊळ” म्हणून लेख आलाय. गावातल्या जुन्या दगडी, हेमाडपंथी देवळाची गोष्ट. त्या वास्तूशी जवळीक सांगणाऱ्या कोवळ्या वयातल्या आठवणी. आणि मग अचानक गावकीनं निर्णय घेऊन देवळाला केलेली ऑइल पेंटची रंगरंगोटी. सुंदर देवळाचं असं विद्रूप होणं त्यांच्यातल्या कलाकाराला किती अस्वस्थ करून गेलं असा तो एकंदर लेखाचा नूर….!

हे वाचता वाचता, सहज मी ते वर्तमानाशी जोडत गेलो.

गेलं साधारण वर्षभर मी व्हॉट्सअप वापरतोय. खाजगी कमी. बहुतांशी दुकानाच्या ऑर्डर्ससाठी. वेगवेगळ्या प्रांतातील सर्वभाषिक मंडळी आमची ग्राहक आहेत. त्यामुळं हिंदी, मराठी, इंग्रजी सर्वच भाषांतून विचारणा सुरू असतात. इतर भाषिकांचं सोडून देऊ. पण माझं सर्वसाधारण निरीक्षण असं की मराठी भाषकांना आपल्याच देवनागरी लिपीचं भयंकर वावडं आहे.

यातले हाताच्या बोटावर मोजण्याइतके अपवाद वगळता सगळे जण सर्रास रोमन स्क्रिप्ट मध्ये मराठी टाईप करतात.

काय प्रॉब्लेम आहे हा? कुणालाच त्यात काही गैर वाटत नाही. मी त्यातल्या अनेकांना न राहावून हा प्रश्न विचारतो की बाबांनो, का करता असं? तर सार्वत्रिक उत्तर म्हणजे ” मराठी टाईप करायचं म्हणजे कसलं कंटाळवाणं काम ! त्यापेक्षा हे सोप्पं आहे “

खरंच इतकं कठीण आहे का देवनागरी लिहिणं? इतकं वेळखाऊ का वाटतं आपल्याला आपल्याच लिपीत लिहिणं? की देवनागरी हा फक्त कॅलिग्राफी (सुलेखन) करण्यापुरता वापरून सोडून द्यायचा विषय आहे?

कितीतरी लोक आमच्या दुकानात आता गणपतीस्तोत्र, मारुतीस्तोत्र, रामरक्षा इंग्रजीत आहे का असं विचारतात. म्हणजे आता

भीमरूपी महारुद्रा

हे

Bheemroopee Mahaarudraa असं छापायचं का?

उद्या कुणी म्हणेल म्हणून

लाभले आम्हांस भाग्य

बोलतो मराठी

हे

Laabhale amhans bhagya

Bolato marathi

असं छापायचं?

आणि मग छत्रपतींच्या घोषणा

Har Har Mahadev

अश्या लिहायच्या?

त्यासुद्धा “आम्ही मराठी” असं छातीठोकपणे सांगणाऱ्या  माणसांसाठी??

 

ज्या लिपीत केवळ २६ वर्ण – त्यातही ५ स्वर आणि २१ व्यंजनं – आहेत ती रोमन समृद्ध?

की ज्यात अ ते ज्ञ असे तब्बल ४८ वर्ण – त्यात अ आ इ ई….असे १२ स्वर आणि क ते ज्ञ अशी ३६ व्यंजनं आहेत ती देवनागरी लिपी?

कृपया लक्षात घ्या मी भाषेबद्दल बोलत नाहीये, लिपीबद्दल बोलतोय. इंग्रजी भाषेच्या समृद्धीबद्दल माझ्या मनात तीळमात्र शंका नाही. पण रोमन  लिपी ( स्क्रिप्ट) मराठी भाषेसाठी का वापरावी किंबहुना का वापरू नये याबद्दल हे पोटतिडकीने केलेलं लिखाण आहे.

आज कालनिर्णय दिनदर्शिकेच्या तमीळ, तेलगू, हिंदी इत्यादि भाषेतल्या आवृत्त्या बघा. आकडे हा दिनदर्शिकेचा प्राण आहे. पण या सगळ्या छपाईमध्ये समान गोष्ट म्हणजे त्यांचे आकडे इंग्रजी भाषेत म्हणजेच रोमन लिपीत आहेत. आपणही असेच बेछूट वागत राहिलो तर साळगावकरांवर मराठी दिनदर्शिकेत इंग्रजी आकडे छापण्याची वेळ येईल हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही.

भाषा हा आत्मा असला तरी लिपीचं शरीर घेऊनच तो वावरतो.

लिपी म्हणजे काय तर चिन्हांचा खेळ. त्यातून विचार आणि भावना व्यक्त केल्या जातात. म्हणून मग आपण आता सर्रास इमोजी वापरतो. शब्द लिहायचा कंटाळा आणि व्यक्त व्हायला सोप्पं माध्यम !  म्हणजे  एका अर्थी पुन्हा आपण आदिमानवाच्या सांकेतिक भाषेकडे चाललो आहोत. ( माझ्या कोणत्याही लिखाणात मी कधीही इमोजी वापरत नाही.)

आज जगभर हेच मंथन चालू आहे. अनेकांचं म्हणणं हेच की भावना कळल्या की झालं ! पण भाषा म्हणून जसं सौंदर्य आहे तसं लिपी म्हणून आहेच की ! ते नाकारून कसं चालेल? आपलं नुसतं नाव लावून भागतं का….. आपल्या नावापुढे वडिलांचं नाव, आडनाव हे सगळं लावावसं वाटतं ना? परंपरा आणि वारसाच  तर सांगतो त्यातून. भाषा आणि लिपी यांचं नातंही असंच परंपरेचं आणि वारशाचं नातं आहे.

आज एकट्या अच्युत पालवांच्या सुलेखनाच्या जोरावर आपण देवनागरी नाही वाचवू शकत. ( जर्मनीत जगातल्या सर्व लिपींचे नमुने असलेलं संग्रहालय आहे. तिथलं देवनागरी लिपीतलं लिखाण पालव सरांच्या हातातून सजलंय…). भाषा आणि लिपी हा समूहाचा हुंकार आहे.

जागतिकीकरणाच्या फायद्यांबरोबर येणारे जे छुपे आणि भयंकर उत्पात घडवणारे तोटे आहेत त्यातला महत्त्वाचा एक म्हणजे जीवनाच्या प्रत्येक अंगातलं संपुष्टात येणारं वैविध्य…! भाषा, लिपी, आहार, शेती, पोशाख या सगळ्यात येणारा एकजिनसीपणा आणि त्यातून समूळ नष्ट होत चाललेलं “देशी वाण” हा गांभीर्याने घ्यायचा विषय आहे. जागतिकीकरणाला विरोध नाही पण त्यापुढे लोटांगण घालताना स्वत्व हरवणं भयावह आहे.

एकच सांगतो, आजही मी माझे बँकेचे चेक लिहिताना स्वच्छ मराठी भाषा आणि देवनागरी लिपीचाच वापर करतो. अगदी आमच्या रोटरी इंटरनॅशनलचे चेकसुद्धा..( आणि ते पासही होतात)!

अवचटांच्या आजच्या लेखातलं हेमाडपंथी मंदिर आणि त्याला फासलेला ऑइलपेंट हे चित्रं मला का अस्वस्थ करून गेलं हे एव्हाना तुमच्या लक्षात आलं असेलच.

माझं हे लिपीपुराण वाचून रोमन स्क्रिप्टमध्ये मराठी टायपिंग करणाऱ्या एका तरी बहाद्दराचे किंवा वाघिणीचे मतपरिवर्तन झाले तरी,

याचसाठी केला होता अट्टाहास……!

 

श्री मयूरेश गद्रे

गद्रे बंधू, डोंबिवली

(१६ मे २०२१)

संग्राहक – श्री आनंद  मुळे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ बाजारहाट ☆ श्री अमोल अनंत केळकर

श्री अमोल अनंत केळकर

? मनमंजुषेतून ?

☆ बाजारहाट ☆ श्री अमोल अनंत केळकर ☆ 

खरेदी पूर्वीची ते आँन लाईन

आठवडी बाजार आणि जत्रा या  प्रत्येक गावाच्या वैशिष्ट्यपुर्ण गो़ष्टी. शनिवार म्हणले की  आम्हाला आठवतो आमच्या गावचा म्हणजे सांगलीचा आठवडी बाजार. मारुती रोड पासून हरभट रोड ते कापड पेठ, गणपती पेठे पर्यत पसरलेला. आजच्या आँनलाईन खरेदी आणि लाँकडाऊन च्या प्रार्श्वभूमीवर याबाबतच्या आठवणी

तसं पहायला गेलं ते प्रत्येक व्यक्तीची खरेदीची सुरवात अगदी लहानपणापासून सुरु झालेली असते. पूर्वी आपल्या घरी नातेवाईक / ओळखीचे/ शेजारचे कुणीही कधीही अगदी अचानक येऊ शकत. फोनवर विचारून येणे, आधी Appointment घेणे मग येणे वेगैरे मँनर्स सांभाळण्याचा तो काळ नव्हताच मुळी. आणि घरी आलेल्याला चला सगळे मिळून हाँटेलात जाऊ आम्ही पण अजून या हाँटेलात गेलो नाही असे म्हणायचे ही ते दिवस नसायचे. अश्यावेळी आलेल्या पाहुण्यांसाठी चक्क घरात पोहे/ उपमा/ शिरा / चहा / सरबत असं काहीस बनवले जायचे.

कधीकधी अचानक आलेल्या स्नेंहीमुळे आईची गडबड व्हायची, चहा घेणार का?  असे विचारताच चक्क ‘हो’  म्हणायचा तो काळ असायचा आणि थांबा आधण ठेवते असे म्हणायला आणि चहा पुड संपलीय हे लक्षात यायला एकच गाठ पडायची.

अशावेळी जा ग / जा रे कोप-यावरच्या दुकानातून चहा पुड/ आले/ बिस्किटं घेऊन ये अशी आँर्डर दिली जायची. पैसे नंतर देते असं सांग काकांना आणि काका चक्क तयार व्हायचे.  घेतलेल्या सामाना बरोबर हातावर श्रीखंडाची गोळी ठेवायला विसरायचे नाहीत

साधारण लहानपणी पहिल्यांदा अशा प्रकारचा बाजारहाट केलेला सगळ्यांनाच आठवत असेल.

वाड्यात मित्र-मैत्रिणींबरोबर खेळ ऐन रंगात आला असताना आईचे बोलवणे आणि काहीतरी आणायला सांगणे हे जीवावर आल्यासारखे वाटायचे. मलाच का आई दरवेळेला बोलवते, माझ्या बहिणीला / भावाला पण कधी बोलवत नाही याचे दु:ख ही वाटायचे मात्र अभ्यास करत असताना असे बाहेर जाणे मात्र आवडायचं

जसं जसं मोठे होत गेलो तसे खरेदीचा आवाका वाढला आणि मग आम्हाला  आठवडा बाजारासाठी कामाला लावण्यात आले. आठवडा  बाजारासाठी यादी करणे, घरातल्यां  बरोबर  खरेदीला जाणे, दुकान (यादी) वाटून घेणे, खरेदी झाल्यावर मारुती मंदिरात समोरील रसवंती गृहात बसून लिटरच्या मापात उसाचा रस पिणे, ऐनवेळच्या यादी व्यतिरिक्त जास्ती खरेदीची मजा घेणे, बाजारहाट करताना बरोबरचीचे मित्र – मैत्रिणी भेटणॆ, त्यांचे पालक भेटणे,  मग आपल्या पालकांची ओळख करुन देणे, मग चर्चा अभ्यासावर येणे यात नेमके समोर शाळेतल्या बाई येऊन सामील होणे मग हळूच आई मी तिकडे ते घेऊन तिथे थांबतोय/ थांबतीय  ग म्हणून सटकणे, दरावरुन घासाघासी करणे, दर पटला नाही म्हणून पुढे जाणे (आणि परत पहिल्या वाल्याकडूनच त्याच दरात वस्तू घेणे), बाजूच्या मंदीरातील देवाला रस्त्यावरुनच चप्पल काढून हात जोडणे, सगळी ओझी सांभाळत चालत घरी येणे,  माल खराब निघाला तर दुस-यादिवशी बदलून घेणे त्यासाठी भांडण करणे , येताना आणि चार नवीन गोष्टी आणणे

हु:श दमलो / दमले  म्हणत परत घरात आईला मदत करणे

मस्त बाजारहाट असायचा तो. त्याची मजा माँल मधील अलिप्त वाटणा-या खरेदीला नाही, आँनलाईन खरेदीला तर नाहीच नाही. आँन लाईन खरेदी मधून “हाती आले ते पवित्र झाले ” या न्यायाने जी काही वस्तू आली ती स्विकारायची. काही कारणाने बदलायची झाल्यास ” भिक नको पण कुत्र आवर ” अशी परिस्थितीत.  त्या सगळ्या प्रोसीजर पेक्षा परत बाजारात जाऊन प्रत्यक्ष परत नवीन वस्तू आणलेली एकवेळ परवडेल. पण अर्थात श्रम / त्रास यातून थोडी मुक्तता मिळते हे नक्की

पण पारंपारिक बाजारहाट ची मजा काही वेगळीच होती हे नक्की आणि आपल्या पिढीने मस्त एन्जाॅय केला बाजारहाट, बरोबर ना?

(बाजार उठवणारा) अमोल ?

©  श्री अमोल अनंत केळकर

२२/०५/२१

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ एक दुपार ….. ☆ सौ. दीपा नारायण पुजारी

सौ. दीपा नारायण पुजारी

?मनमंजुषेतून ?

☆ एक दुपार ….. ☆ सौ. दीपा नारायण पुजारी ☆

ढेबेवाडी! एक टुमदार लहानसं खेडं! त्या गावातील बस स्टॅण्ड जवळच एक लहानसं तळं होतं. पाऊस चांगला झाला तर ते थोडं तलावासारखं दिसे. एरवी वर्षभर  ते  डबकं असे. या तळ्याच्या काठावर मोठे मोठे खडक होते. जवळच एक वडाचं झाड होतं. पंचायतीच्या मदतीने झाडाभोवती एक पार बांधला होता.झाडाची सावली खडकांच्या काही भागांवर पडत असे.झाडाच्या चारी बाजूंनी पारंब्या लोंबत होत्या. सकाळी गावातल्या बायका धुणीभांडी करायला येत. संध्याकाळी पुरुष लोकांची बैठक असे पारावर.गावातल्या मुलांसाठी हे एक प्रकारचं जिमच होतं म्हणा ना!

आज ऊन्हाचा तडाखा काही वेगळाच होता. उन मी म्हणत होतं. झाडाचं एकही पान हलत नव्हतं. एस. टी स्टँड च्या पायऱ्यांवर बसलेला लंगडा भिकारी कुणीतरी दिलेला पावाचा कोरडाच तुकडा खात होता. खाऊन झाल्यावर त्यानं हात अंगातल्या घामानं भिजलेल्या कळकट्ट शर्टच्या बाहीला पुसला. त्याच हातानं त्यानं कपाळावरुन खाली ओघळलेला घामही पुसला. पावाचे कण त्याच्या घामानं चिकचिकलेल्या गालाला चिकटले.आता त्याला तहान लागली . शेजारी पायरीला टेकवून ऊभी केलेली काठी त्यानं उजव्या हातानं पकडली. लंगडत लंगडत काठी ओढत तो समोरच्या कोपऱ्यातल्या नळावर गेला.अशक्त , कृश, ऊजवा पाय वर करुन , काठी आधारासाठी काखेत धरून त्यानं तोटी फिरवली. किं. . ‌ . किं. . किं. . करत नळ उघडला.आपली हाताची ओंजळ तोल सावरत तोटीला लावली. ओणवा होऊन त्यानं तोंड ओंजळीपर्यंत नेलं. पाण्याचे काही थेंब त्याच्या हातावर सांडले. नळ भकास तोटी करून त्याच्या ओंजळीकडं कोरडाच बघत होता.आपलं तोंड ओंजळीला लावून ते थेंब तीर्था सारखे त्यानं चाटले. वडावरचे दोन कावळे कर्कश काकसूर लावत उडाले.धाडधाड आवाज करत दोनची एस. टी. स्टॅंडवर आली. त्या लाल डब्याच्या खिडकीच्या काचा खणखाण आवाज करत ओरडल्या. कंडक्टर धाडकन दार उघडून उतरला. त्यानं शिट्टी कर्कश्शवाणी वाजवून एस. टी. मागं घेतली. पुण्याच्या थांब्यावर आणून थांबवली. एस. टी च्या लाला पिवळ्या पत्र्यावर हातानं थाड थाड वाजवून ड्रायव्हरला ब्रेक लावायचा इशारा दिला.एस. टीनं मागच्या धुराड्यातून काळा गरम धूर सोडला. भस्स भस्स आवाज करत , श्वास टाकत तिचा वरखाली होणारा ऊर हळूहळू शांत झाला. ड्रायव्हरनं त्याच्या सीटवरून खाली ऊडी मारली.त्याच्या बाजूचं अर्धं दार खाडकन उघडून थाडकन बंद केलं. खिडकीची आधीच खिळखिळी झालेली , तुटलेली काच आपलं अस्तित्व दाखवत आवाज करत खुडमुडली.

आपले नाकावर नसलेले मास्क कानाच्या खुंटीवरून काढून दोघं चहाच्या टपरीकडं वळले.

एवढा वेळ बाकड्यावर वाट बघत बसलेले सरपंच, उपसरपंच, कोरोनाची पुण्यातली ताजी खबर ऐकायला पोट आणि पोटावरून घसरणारी पॅंट सावरत टपरी कडं पळाले. लगोलग चार-पाच जणांचं टोळकं तयार झालं. कोरोनच्या बातम्या रंजकतेनं सांगितल्या जाऊ लागल्या. स्टार माझा किंवा आजतक पेक्षा जास्त रंजक, भडक, अतिरंजित आणि धडकी भरवणाऱ्या होत्या.

गण्या, परशा आणि वासू थोडा वेळ ऐकत थांबले.

नंतर ते तळ्याकडं गेले. पाण्यात पाय सोडून ते खडकावर बसले.

त्यांच्या गावात अजूनही कोरोनाचं पाऊल पडलं नव्हतं. पण सायन्सच्या मोघे सरांनी सांगितलेल्या गोष्टी त्यांच्या लक्षात होत्या. या महामारीचं गांभीर्य त्यांना समजलं होतं. ऑक्सिजन अभावी होणारे मृत्यू, ऑक्सिजन गळती, हॉस्पिटलमध्ये सातत्यानं होरपळणारे पेशंटस्. बातम्या ऐकून आज त्यांचा सूर पारंब्या चा खेळ थांबला होता. पाण्यात भाकरी ऊठत नव्हत्या. लहान लहान पावलं स्थिर होती. पाण्यात हलवून लाटांचा आवाज सुध्दा करत नव्हती.

वासूचा चेहरा खूपच गंभीर झाला होता.

तो म्हणाला, “काहीतरी करायला पाहिजे गड्या.”

परशा, जा बर, आपल्या सगळ्या दोस्तांना बोलव इकडं”

परशानं ओळखलं, वासूच्या डोक्यात काही तरी शिजतय. तो पळालाच. पळता पळता तो हाका मारत होता. “ए गंम्प्या, ए, मन्या या रे तळ्यावर.”

“अरे एक राजा चल की. वाश्या बोलवतोय बघ.”

थोड्याच वेळात वडाखाली वानरसेना जमली. सावल्या लांब होईपर्यंत चर्चा सुरू होती. टोळक नंतर मोघे सरांच्या घराकड गेलं.

दुसऱ्या दिवशी सकाळी आठची गाडी गावच्या वेशीवर च आडवली गेली. वासू, गण्या, परशा बरोबर त्यांचे बरेच शाळासोबती रस्ता अडवून ऊभे होते. ड्रायव्हरला गाडी थांबवावीच लागली. कंडक्टर खाली उतरला. वासू त्याच्याशी काही बोलला. गाडी तून एक एक पॅसेंजर खाली उतरु लागले. गण्या थर्मल गन घेऊन ऊभा होता. परशा  प्रवाशांनी मास्क नीट घातलाय ना हे बघू लागला.

वासू प्रत्येकाच्या बोटाला oxymeter लावून बघत होता. राजा तेवढ्यात भाषण ठोकून कोरोनाच्या सोवळ्याचे नियम सांगू लागला.काही मुलांनी गावात, स्टॅंडवर, जिथं जमेल तिथं कोरोनात घेण्याच्या काळजी घे, नियमांचे फलक लावले.आख्ख्या ढेबेवाडीचा नूरच बदलला.सरपंचांनी चावडीवर मुलांना सहकार्य करण्याचं फर्मान  सोडलं.आजही उन्हाळा तोच होता. रखरख तशीच होती. स्टॅंडवर एस. टी तशीच खडखडाट करत येत होती. पण एक सूज्ञ विचारांचा वारा गावात गारवा पसरवत होता. तळ्यातलं पाणी लहान लहान लाटांतून हसत होतं.

वडाखाली गाय शांत झोपली होती. वडाच्या झाडाची हिरवी सळसळ वाऱ्याबरोबर आनंद तरंग पसरवत होती.

 

सौ. दीपा नारायण पुजारी

इचलकरंजी

9665669148

[email protected]

 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares
image_print