मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी वाटचाल…. मी अजून लढते आहे – 17 ☆ सुश्री शिल्पा मैंदर्गी

सुश्री शिल्पा मैंदर्गी

☆ मनमंजुषेतून ☆ माझी वाटचाल…. मी अजून लढते आहे – 17 ☆ सुश्री शिल्पा मैंदर्गी ☆

सौ.अंजली गोखले 

(पूर्ण अंध असूनही अतिशय उत्साही. साहित्य लेखन तिच्या सांगण्यावरून लिखीत स्वरूपात सौ.अंजली गोखले यांनी ई-अभिव्यक्ती साठी सादर केले आहे.)

ज्या प्रमाणे  कळीमधून कमळ हळू हळू उमलत जावे, त्याममाणे माझा सर्वांगीण विकास हळूहळू होत होता. माझ्या व्यक्तिमत्वातील सूप्त गुण फुलत होते. नवरत्न दिवाळी अंकाच्या माध्यमातून आमचा छोटासा महिला वाचन कट्टा तयार झाला. त्यामध्ये आम्ही कविता वाचन हिरीरीने करतो. त्यातीलच सौ.मुग्धा कानिटकर यांनी त्यांच्या घरी हॉल मध्ये माझ्या एकटीचा नृत्याचा कार्यक्रम ठेवला होता. त्यांनी आपल्या अनेक मैत्रिणींना आमंत्रित केले होते. त्यामध्ये मी भरतनाट्यम चा नृत्याविष्कार सादर केला आणि कविताही सादर केल्या नाट्य सादर केले.त्या सर्वांनी माझे तोंड भरुन कौतुक केले.त्यांच्या शाब्बासकी मुळे मला खूप प्रोत्साहन मिळाले.

त्यापाठोपाठ तसाच कार्यक्रम मिरजेतील पाठक वृद्धाश्रमात मला आठ मार्च महिला दिनी कार्यक्रम सादर करण्याची संधी मिळाली. सर्व आजी कंपनी मनापासून आनंद देऊन गेल्या आणि त्यांनी मला भरभरून आशीर्वाद दिले.

5 जानेवारी 2020 रोजी आमच्या नवरत्न दिवाळी अंकाच्या पुरस्कार वितरण सोहळा, सेलिब्रिटी श्रीयुत प्रसाद पंडित यांच्या उपस्थितीत साजरा झाला. त्याप्रसंगी मला स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जयोस्तुते हे गीत नृत्य रुपात सादर करायला मिळाले.विशेष म्हणजे सुरवाती पासूनच सर्व प्रेक्षकांनी टाळ्यांचा ठेका धरला होता आणि नृत्य संपल्यावर सर्वांनी त्या गाण्याला आणि नृत्याला उभे राहून टाळ्यांच्या कडकडाटात अभिवादन केले. अर्थात हे मला नंतर सांगितल्या वर समजल. विशेष म्हणजे श्री प्रसाद पंडित यांनी कौतुकाची थाप दिली आणि मला म्हणाले, ” शिल्पाताई, आता आम्हाला तुमच्या बरोबर फोटो काढून घ्यायचाय.”

माझ्यातील वक्तृत्वकला ओळखून मी सूत्रसंचालन ही करू शकेनअसे वाटल्याने लागोपाठ तीन मोठ्या कार्यक्रमांचे सूत्रसंचालन करण्याची संधी मला दिली गेली. एका नवरत्न दिवाळी अंकाच्या प्रकाशनाचे सूत्रसंचालन गोखले काकू यांच्या मदतीने मी यशस्वी करून दाखवले.ते अध्यक्षांना नाही इतके भावले की त्यांनीच माझा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला.त्यानंतर माझा भाऊ पंकज न्यायाधीश झाल्यानंतर आई-बाबांनी एक कौतुक सोहळा ठेवला होता. त्याचेही दमदार सुत्रसंचलन मीच केले ज्याचे सर्वांनी खूप कौतुक केले. दुसऱ्या दिवशी पंकज दादा मला म्हणाला, ” शिल्पू ने समोर कागद नसतानाही काल तोंडाचा पट्टा दाणदाण सोडला होता.” तसेच माझी मैत्रिण अनिता खाडिलकर हिच्या “मनपंख” पुस्तकाचे प्रकाशनझाले त्यावेळी त्या पुस्तकाच्या प्रकाशनाचे सूत्रसंचालन ही मी यशस्वी रित्या पार पाडले.

माझ्या डोळ्यासमोर कायमस्वरूपी फक्त आणि फक्त गडद काळोख असूनही मी माझ्या परिचितांच्या कार्यक्रमांमध्ये सुत्रसंचलन रुपी प्रकाशाची तिरीप आणू शकले याचे मला खूप समाधान आहे.

…. क्रमशः

© सुश्री शिल्पा मैंदर्गी

दूरभाष ०२३३ २२२५२७५

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ बालपणीच्या आठवणी…माझे बालपण भाग-6 – खजिना ☆ सौ. अमृता देशपांडे

सौ. अमृता देशपांडे

 ☆ मनमंजुषेतून ☆ बालपणीच्या आठवणी…माझे बालपण भाग- 6 – खजिना ☆ सौ. अमृता देशपांडे ☆ 

अशी व्याख्याने, मूल्याधिष्टित कार्यक्रमांना आम्हां मुलांना घेऊन जाणे, आपल्या संस्कृतीची  ओळख करून देणे ह्या बाबतीत आईबाबा नेहमीच सतर्क होते.

विद्यापीठ हायस्कूलच्या ग्राउंडवर राष्ट्र सेविका समितीच्या पूज्य लक्ष्मीबाई केळकर ऊर्फ मावशी यांची रामायणावर प्रवचने होती. ती पण रात्रीचीच.   विद्यापीठ हायस्कूल घरापासून खूपच लांब होतं. चालतच जावं-यावं लागणार होतं. सहदेव म्हणून हाॅस्पिटलचेच  एक कर्मचारी,  त्यांना विनंती करून आईने त्यांना व त्यांच्या पत्नीला सोबतीला बरोबर घेतले.

वंदनीय मावशी यांची वाणी झुळुझुळु वहाणारं गंगेचं पाणी.  शांत चेहरा, शांत बोलणं, स्पष्ट उच्चार, जमिनीवर आसनावर पालथी मांडी घालून बसलेल्या, शुभ्र नऊवारी लुगडे, दोन्ही खांद्यावरून पदर घेतलेला, शुभ्र रूपेरी केस, नितळ गौरवर्ण.

रोज प्रवचनाच्या सुरवातीला प्रार्थना केली जात होती.

“ही राम नाम नौका भवसागरी तराया

मद, मोह, लोभ सुसरी, किती डंख ते विषारी

ते दुःख शांतवाया मांत्रिक रामराया ।।

सुटले अफाट वारे मनतारू त्यात विखरे

त्या वादळातुनिया येईल रामराया ।।

भव भोव-यात अडली नौका परि न बुडली

धरुनी सुकाणु हाती बसलेत रामराया ।।

आम्ही सर्व ही प्रवासी जाणार दूरदेशी

तो मार्ग दाखवाया अधिकारी रामराया ।।

प्रभु ही तुझीच मूर्ती चित्ती सदा ठसू दे

मनमानसी या कृपा तुझी असू दे ।।

एकदा बोलायला सुरुवात केली की ऐकताना दीड तास कधी संपला कळतच नसे. अफाट जनसमुदाय,  pin drop silence.

व्यासपीठावर प्रभु रामचंद्रांचा हार घातलेला ‘ पंचायतन’ फोटो. उदबत्तीचा वातावरणात भरून राहिलेला दरवळ आणि मावशींचं ओघवतं, निर्मळ वक्तृत्व.  सग्गळा परिसर रामनामाने भारलेला असे.

प्रवचनात रामायणातल्या व्यक्तिंची,  त्यांच्या स्वभावांची , वर्तणुकीची आणि घडलेल्या घटनांची गोष्टीरूप ओळख करून देताना,  मावशी जीवनातल्या प्रत्येकाच्या जबाबदारी पेलण्याचे, वागण्याचे,विचारांचे स्वरूप कसे असावे यावरही बोलत असत. त्यावेळी हे सर्व कळण्याचं आमचं वय नव्हतं. खूपसं कळायचं नाही. राष्ट्रसेविका समितीचे कार्य हे व्यक्ती आणि कुटुंबापासून देशसेवेपर्यंत व्यापलेले होते. हे कार्य करताना व्यक्तिविकास, कुटुंबातली प्रत्येकाची कर्तव्ये आणि समाजातला आपला वावर हा देशसेवेसाठीच असला पाहिजे,  हे शिकवणारे.

राजूनं,  माझ्या भावानं  या संदर्भातली एक आठवण सांगितली.  एकदा प्रवचनाच्या आधी आई मावशींना भेटायला गेली. मी बरोबर होतो. आईनं विचारलं,  मावशी,  मी कशाप्रकारे देशसेवा करू शकते? त्यावर मावशी म्हणाल्या,  तू घरचं सगळं सांभाळतेस, पतीला योग्य सहकार्य देतेस, भविष्य काळातली चार आयुष्ये घडवते आहेस, हेच निष्ठेने करत रहा, हीच देशसेवा.

त्या दिवशीच्या प्रवचनात मावशींनी हाच विचार उलगडून दाखवला.  प्रत्येकाने आपले कर्तव्य निष्ठेने,  आपुलकीने आणि जबाबदारी ने करणे, हीच रामायणाची शिकवण आहे.

काही वर्षानंतर, राष्ट्र सेविका समितीच्या शिबिरात माझे व माझ्या बहिणीचे नाव आईने नोंदवले. 21 दिवसाच्या शिबिरात स्वावलंबन, स्वसंरक्षण, देशाभिमान, अशा अनेक मूल्यांवर आधारित बौद्धिके, खेळ, आणि परस्पर संवाद यातून व्यक्तिमत्व विकास घडवण्याचे  संस्कार नकळत आमच्यात रुजले.  खरंतर हे त्यावेळी कळले नाही, पण पुढे अनेक प्रसंगात आपोआप बुध्दी तसाच विचार करू लागली. हळूहळू खरेपणा  आयुष्यात किती महत्त्वपूर्ण आहे, ह्याची जाणीव झाली.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे हे तडफदार, अभिमान वाटावा असं व्यक्तिमत्व.  जणु दुसरे शिवराय अशी देहयष्टी,  पेहराव, दाढी, डोळ्यांत तीच चमक आणि अस्खलित वाणी.

तर मावशी अतिशय नम्र, आणि केवळ आदर करावा अशा. माया, ममता, प्रेम हे सगळे शब्द एकाठिकाणी सामावलेलं व्यक्तिमत्व. शिस्त आणि करारीपणा ही त्यांची दुसरी बाजू.

श्रोत्यांवर नकळत संस्कार घडत होते. व्याख्याने,  प्रवचने ऐकून दुस-या दिवशी त्यावर गप्पा मारत जेवणे, हा आमचा आवडता छंद म्हणा किंवा काही, पण त्यावर बोलायला आवडायचे. कधी कधी न समजलेलं आई समजून सांगायची. त्यावेळी ह्याचं मोठंसं महत्व जाणवलं नाही. ते सहजरित्या होत होतं.

पुढे आयुष्यात कळलं की ते किती छान आणि महत्वाचं होतं.

बालपणीच्या आठवणी लिहिता लिहिता परत लहान झाल्यासारखे वाटले.

खरंच किती सुंदर असतं नाही बालपण! आई बाबा,  बहीण भाऊ, , छोटंसं जग. इथे स्पर्धा नाही, स्वार्थ नाही, राग नाही.

“या बालांनो या रे या” कवितेतली खरी

“सुंदर ती दुसरी दुनिया”

“बचपन के दिन भी क्या दिन थे”

“उडते बन की  तितली”

समाप्त

© सौ अमृता देशपांडे

पर्वरी- गोवा

9822176170

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ नाते- इंद्रधनुष्यी बंध ☆ सौ. ज्योत्स्ना तानवडे

सौ. ज्योत्स्ना तानवडे

 ☆ मनमंजुषेतून ☆ नाते- इंद्रधनुष्यी बंध ☆ सौ. ज्योत्स्ना तानवडे ☆ 

जे मनामनाला जोडते ते नाते

जे चराचराला जोडते ते नाते !!

असंख्य वेगवेगळी नाती जन्मापासून आपल्याला अवघ्या विश्वाशी बांधून टाकतात. या प्रत्येक नात्याचे

रूप वेगळे,भाव वेगळा,

रीत वेगळी प्रीत वेगळी !

आपण आयुष्यात असंख्य नात्यांनी एकमेकांशी बांधले गेलेलो असतो. या प्रत्येक नात्याचे स्थान, त्याचे महत्व, त्याची गरज, त्याचे निभावणे हे वेगवेगळे असते.

सर्वात प्रथम आपण ईश्वरीतत्त्वाशी बांधले गेलेलो असतो. त्यानंतर आयुष्यात महत्त्वाचे असते ते आई-वडिलांचे श्रेष्ठ आणि पवित्र नाते.

 माय-बाप असती

 सर्वस्व या जन्माचे

 त्यांच्यामुळेच होई

 सार्थक या जीवनाचे !!

आई-वडील आपल्याला उत्तम आरोग्य, उत्तम संस्कार, उत्तम विचार, उत्तम शिक्षण यांची मौल्यवान शिदोरी देऊन या विश्वाच्या प्रवासाला सोडतात. त्यामधे आपल्या आयुष्याची भावनिक बाजू ही आईने तर व्यावहारिक बाजू वडिलांनी व्यापलेली असते. व्यवहार म्हटले की रूक्षपणा आलाच. पण सर्वच गोष्टी नुसत्या भावनेवर चालत नाहीत तर व्यवहार हा पहायलाच लागतो. त्यामुळेच वडील थोडे कठोर वाटतात. पण नारळातले पाणी किंवा फणसातल्या गऱ्यांप्रमाणे त्यांचे मन असते.

‘दुधावरची साय’ म्हणजे तर संसाराचे संचित असते. नातवंडे ही आजी-आजोबांचे सुख निधान असतात, तर नातवंडांना आजी-आजोबा अतिशय प्रिय असतात. आजच्या बदलत्या वातावरणात नातवंडे पाळणाघरात तर आजोबा वृद्धाश्रमात हे दुर्दैवी वास्तव आहे.तरीही दोघांना एकमेकांची ओढ असते म्हणूनच ते एकमेकांना भेटायची कारणेही हुडकत असतात.

आपल्या आयुष्यातले आणखी एक लोभस नाते आहे मैत्रीचे. मैत्री अखंड विश्वासाची साथ देते, कायम मदतीचा आधाराचा हात देते, निरपेक्ष प्रेम देते. असे मैत्र  ज्यांना लाभते ते खरच भाग्यवंत असतात. मैत्रिणीने,’ मी आहे ना? काळजी करू नको,’ असे नुसते म्हटले तरी हे शब्द आपल्याला संजीवनी सारखेच वाटतात.

आपल्या वाटचालीत आपल्या मदतीला येते ती आपली कामवाली सखी. अनेक वर्षांच्या सहवासाने आपणही तिच्याशी एखाद्या मैत्रिणी सारखे वागू लागतो.तिच्याजवळ मन मोकळे करू लागतो. ती पण स्वत:ची सुखदुःखे आपल्याशी वाटून घेते आणि कामाबरोबरच जीवाला विसावा शोधत रहाते.

अशी असंख्य नाती आपण रोजच्या जगण्यात निभावत असतो.

निसर्गाशी आपले नाते हे तर जिवाभावाचे असते. निसर्ग आपला माय बापच आहे. तो आपले पालनपोषण करतो, रक्षण करतो. त्यामुळे त्याचेही संवर्धन, रक्षण करणे हे आपले महत्त्वाचे  कर्तव्य ठरते.

आपण अशा रीतीने आपल्या आयुष्यात घरातल्या, घराबाहेरच्या,निसर्गातल्या घटकांशी वेगवेगळ्या नात्यांनी बांधले गेलेले असतो. या प्रत्येक नात्याचा रंग वेगळा, गंध वेगळा, प्रत्येकाची नजाकत वेगळी आणि त्यामुळेच त्यातून मिळणारी अनुभूती पण वेगळीच असते.

“पैशाने श्रीमंत होणे खूप सोपे असते.

नात्यांनी समृद्ध होणे तितकेच कठीण असते.”

म्हणूनच आपल्याला लाभलेल्या नात्यांची समृद्धी आपण जपली पाहिजे. एकमेकांना वेळ देणे, एकमेकांचे ऐकून घेणे, मदत करणे, एकमेकांचे विचार नाही पटले तर सोडून देणे, माफ करणे अशा अनेक गोष्टींनी ही नाती जपणे शक्य आहे. असे म्हणतात ज्यांना आयुष्यात शांती हवी असेल  त्यांनी वादविवादात एक पाऊल मागे घ्यावे. पण इतरांकडून ती अपेक्षा करू नये. त्यामुळे आपण नात्यांचा आनंद घेऊ शकतो आणि इतरांच्याही आनंदात भर घालू शकतो.

© सौ. ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ काॅलेजचे दिवस.. ☆ सौ. राधिका भांडारकर

सौ. राधिका भांडारकर

 ☆ मनमंजुषेतून ☆ काॅलेजचे दिवस.. ☆ सौ. राधिका भांडारकर ☆ 

आमच्या वेळी १०+२ अशी शिक्षण पद्धती नव्हती.

अकरावी पर्यंत शाळा असायची.आणि मग काॅलेज जीवन सुरु.

शाळेच्या शेवटच्या वर्षापासूनच काॅलेजचे वेध लागले होते. काॅलेज म्हणजे खूप काहीतरी वेगळं, फुलपाखरी वातावरणाचं, जिथे गणवेष नसतो, खूप स्वातंत्र्य असलेलं म्हणजे मनात आलं तर वर्गात जायचं नाहीतर दांडी मारायची.. आणि दांडी मारली म्हणून कुणी शिक्षा करत नाही. आणि एखादे प्राध्यापक असतीलच जरा कडक तर आपल्या ऐवजी मैत्रीणीने present sir म्हटलं तरी आपला अटेन्डन्स लागतो…. कारण शाळेसारखे तिथे प्रत्येक विद्यार्थ्याला ओळखणारे शिक्षक नसतात. वगैरे वगैरे अनेक सूरसकथा ऐकलेल्या होत्या. आणि त्याचं अतीव आकर्षण होतं. आणखी एक, माझं शालेय शिक्षण कन्या शाळेत झालं. त्यामुळे आता मुलांबरोबर एकत्र वर्गात बसून शिकण्याची काय निराळी गंमत असते ते अनुभवायला मिळणार होतं.. मनाच्या खोल कोपर्‍यात कुठेतरी चोरटेपणाने येऊनही गेलं,”……भेटला एखादा स्वप्नातला राजकुमार तर…..”

तेव्हां काॅलेजच्या प्रांगणात पाऊल टाकलं तेव्हा या  सगळ्या गंमतकथा घेऊन… शाळेचा तो तास आणि काॅलेजचे ते लेक्चर, पीरेड. शाळेच्या बाई काॅलेजच्या मात्र मिस.

त्या विवाहित असल्या तरी मिसच… इथे मास्तर नव्हते. इथे सर होते. ते आमच्या डोंगरे मास्तरांसारखे हातात काठी अन् ढगळपगळ कपडे घालणारे नव्हते तर छान सुटाबुटात टाय लावलेले असत..

काॅलेजची ती लेडीजरुम… तिथली मजा औरच होती. तिथे लाॅकर्समधे आपलं सामान ठेवायचं… कधी पीरिएड बंक केला तर मैत्रीणीशी केलेल्या खास गुजगोष्टी असायच्या.. कुणी छान गाणं म्हणत असेल तर तिला गाण्याचा आग्रह करायचा..

कधी मिस किंवा सरांंची नक्कल वगैरे….. मजाच वाटायची सगळ्याची… शिवाय कँटीन या संस्थेशी नव्याने ओळख झाली होती.  रेस्टाँरंटमधे खाण्याची संस्कृती नव्हतीच तेव्हां… त्यामुळे मित्रमैत्रीणीं समवेत मुक्तपणे कधी वडा, कधी मिल्कशेक, नाहीतर कोक प्यायला धम्माल वाटायची…..अर्थात पुन्हा हे सर्व पाॅकेटमनीवर अवलंबूनही असायचंच….पाॅकेटमनी हा एक आणखी पाहुणा शब्द…..

आमच्या काॅलेजमधे सुदैवाने रॅगींग हा प्रकार नव्हता.

मुलांच्यात होतं थोडंफार….फिजीक्स लॅबमधे कुठल्यातरी एका प्रयोगात, एका पात्रात वाफ कोंडवून ठेवल्यामुळे, एक बिच्चारा, काॅलेजयुवकाचा झीरो स्मार्टनेस असलेला मुलगा भाजला होता….कुणीतरी मुद्दाम हे कृत्य केले होते हे नंतर कळले……त्यालाच सतावण्यासाठी..

एकेका वर्षानंतर काॅलेजात चांगलेच रूळलो…

अभ्यास,महत्वाकांक्षा,भविष्याचे विचार होतेच,..

सोबत कॉलेजची गेटटुगेदर्स…आंतरमहावाद्यालयीन नाट्यस्पर्धा…त्या तालमी यांचीही खूप मजा, आनंद, भोगला. काही नाती जुळली. काही तुटली.

काॅलेजच्या बोटॅनीकल गार्डन मधे जीवलग मैत्रीणींबरोबर केलेल्या शेअरींगचे क्षण,आजही तसेच्या तसे आठवतात. भावना बोथट झाल्या असल्या तरी त्या क्षणांनी जे दिलं ते अजुन तसंच आहे मनाच्या खणात…

शेवटचं वर्षं मात्र अभ्यासातच गेलं…आयुष्याची दिशा शोधण्याचं ते वर्ष….आता ही सगळीजणं दूर जाणार.. कुठे कधी कोण भेटणार… काही प्रेमी युगुलांची नाती जमलीही होती… जीवनाच्या वाटेवरचे सोबती भेटले होते… त्यांच्याविषयी कौतुकाबरोबर किंचीत असुयेची छटा होती….आपली वाट अजुन एकलीच…पण सोबत सोनेरी स्वप्नं होतीच की…..

पण असे हे काॅलेजचे रंगीन,सुनहरे दिवस कधी संपले ते कळलंच नाही…

त्यादिवशी फेसबुकवर एक फ्रेंड रीक्वेस्ट होती…

फोटोतला चेहरा नाही पटकन् ओळखला. पण नाव स्मरणात होतं…. नंतरच्या मेसेजमधे त्याने लिहीलं होतं, डोळ्यांवरुन मी तुला ओळखलं…. खूप आवडायचे मला……. गंमत वाटली मात्र… पण माझ्या संस्काराने मात्र रोखलं म्हणताना….

मलाही आवडायचास तू…………!!

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ बालपणीच्या आठवणी…माझे बालपण भाग-5 – खजिना ☆ सौ. अमृता देशपांडे

सौ. अमृता देशपांडे

 ☆ मनमंजुषेतून ☆ बालपणीच्या आठवणी…माझे बालपण भाग-5 – खजिना ☆ सौ. अमृता देशपांडे ☆ 

कोणतं साल होतं नक्की आठवत नाही,  शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरची व्याख्याने होती. खासबान मैदानावर.रोज रात्री नऊ वाजता सुरू होत. संपून घरी परत पोचायला साडेबारा व्हायचे. तुफान गर्दी होती. आम्ही सर्वजण जात असू. शिवाजी महाराजांचे लहानपणापासूनचे प्रसंग,  छोटा शिवबा, जिजाबाई,  शहाझीराजे,  तानाजी मालुसरे, सूर्याजी, नेताजी पालकर, औरंगजेब, शाहिस्तेखान, अफझलखान, रोहिडेश्वराची शपथ, आधी लगीन  कोंढाण्याचं…..असे प्रसंग आणि व्यक्तिरेखा हुबेहूब डोळ्यासमोर उभे केले होते. आम्ही अगदी भारावून गेलो होतो.  आजच्या व्याख्यानात ऐकलेला प्रसंग दुसरे दिवशी आम्ही घरी प्रत्यक्ष नाटकरूपाने अभिनय करायचो. खूपच मजा यायची.  जिजाबाई होण्यासाठी माझी आणि बहिणीची अंजूची वादावादी व्हायची. शिवाजी होण्यासाठी दोघं भाऊ, राजू उजू.ची मारामारी व्हायची. मग आम्ही तह केला. व एकेक दिवस वाटून घेतला.

???

सर्वांत शेवटचा दिवस राज्याभिषेकाचा.

राज्याभिषेक सोहळा प्रत्यक्ष घडवून आणला होता. अनेकजण त्यात अभिनय करत होते. जे आम्ही गेले 15 दिवस घरी करत होतो, ते इथं मोठी माणसे आजचा सोहळा करत होती. प्रचंड प्रचंड गर्दी होती. श्री. बाबासाहेब पुरंदरे खास गुलाबी फेटा बांधून व्याख्यान देत होते.स्टेजवर राज्याभिषेकाचा सेट लावला होता. प्रेक्षक श्वास धरून, जीवाचे कान करून ऐकत होते,  डोळ्यांनी अनुभवत होते. काशीहून आलेल्या गागाभट्टानी मंत्रोच्चाराने सप्तसागर, सप्तसरिताचा पवित्र जलाभिषेक केला. राजवस्त्रे,  जिरेटोप  लेवून राजे सिंहासनाजवळ गेले. त्यांनी सिंहासनाला मुजरा केला. पाय न लावता आरूढ झाले.

शिंग- तुता-या निनादल्या. चौघडे ताशांचा गजर झाला. 32 मण वजनाचे सिंहासन  रोमांचित झाले. दणदणीत आवाजात घोषणा झाली,

” गडपती, गजअश्वपती,  भूपती, प्रजापती, सुवर्णरत्न श्रीपती, अष्टावधान जागृत, अष्टप्रधान वेष्टित, न्यायालंकार मंडित, शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत, राजनीती धुरंधर, प्रौढप्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर,  महाराजाधिराज, राजाशिवछत्रपती महाराज की जय!”

जमलेल्या हज्जारोंनी जयजयकार केला. प्रत्येकाची छाती अभिमानाने भरून आली होती. जयजयकाराने अवघे खासबाग मैदान दणाणून गेले होते. मैदानाच्या बाहेर हजारो लोक उभे होते. अख्खे कोल्हापूर रात्री साडे बारा वाजता जयजयकार करत होते.

दुसरे दिवशी वर्तमान पत्रात सोहळ्याचे फोटो आणि वर्णन वाचले आणि त्या सोहळ्यात आपल्याला उपस्थित रहायला मिळाले, ही गोष्ट भाग्याची,  अभिमानाची वाटली.

नंतर पुढे महिनाभर आमची शिवचरित्राची नाटके चालू होती.  परिक्षा आली म्हणून ते वेड बाजूला ठेवावं लागलं.

हे नकळत आमच्यात रुजलेले संस्कार आयुष्य भराची शिदोरी ठरले.

क्रमशः…

© सौ अमृता देशपांडे

पर्वरी- गोवा

9822176170

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ महापंचमी रथोत्सव सोहळा ☆ सौ. अर्चना देशपांडे 

 ☆ मनमंजुषेतून ☆ महापंचमी रथोत्सव सोहळा ☆ सौ. अर्चना देशपांडे ☆ 

आई जगदंबेचे‌ एक रूप म्हणजे गोव्यातील कवळे येथील श्री शांतादुर्गा देवी.

देवीचे मंदीर सुंदर व भव्य असून पोर्तुगीज व भारतीय स्थापत्य रचनेचे उत्तम उदाहरण आहे.

देवालयाच्या गाभाऱ्यात शांतादुर्गा देवीची मनमोहक आणि तेजस्वी मूर्ती आहे. शंकर आणि विष्णू यांचे भांडण मिटवून दुर्गेने त्यांना शांत केले म्हणून तिचे नाव शांतादुर्गा पडले.

शांतादुर्गा देवी संस्थानाचा वार्षिक जत्रा महोत्सव माघ शुद्ध प्रतिपदा ते माघ शुद्ध अष्टमी पर्यंत चालतो.

माघ शुद्ध पंचमीला पहाटे ४.३० वाजता देवीची मिरवणूक निघते. या वेळी सागवानी चार मजली रथ फुलांनी सुंदर सजविला जातो  त्यावर विद्युत रोषणाई केली जाते.  ती रोषणाई पाहून डोळ्यांचे पारणे फिटते. देवीचे आकर्षक मंदिर व दीपमाळेवरील रोषणाई मुळे शोभा अजूनच‌ वाढते. प्रथम देवळातून  मूर्ती पालखीतून मंदीरासमोर आणली जाते. नंतर  टाळ आणि ताशांच्या गजरात आरती होते.  देवळाला एक प्रदक्षिणा घालून पालखी महारथाजवळ आणली जाते. रथाच्या तिसऱ्या मजल्यावर मूर्ती बसवली‌ जाते व मठाधिपती श्री स्वामींच्या हस्ते नारळ  फोडून महारथ हलवला जातो. सात फुटाहून जास्त व्यास असलेल्या चाकांचा रथ  दोरखंडांनी ओढला जातो. जो तो पुढाकार घेऊन , एकामेकांच्या साथीने  भाविक जन  रथाची  देवळाभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करतात.  ठीक ठिकाणी भाविक रथाला स्पर्श करून श्रद्धेने दर्शन घेतात. प्रदक्षिणा पूर्ण झाली की  सोन्याच्या पालखीतून मूर्ती मंदिरात नेतात पुन्हा मंदिरात आरती होते.

ह्या विलोभनीय दर्शनाने स्थैर्य व शांतता मिळते.

मंदिराची  जागा हरिजनांनी देवस्थानला दिलेली आहे म्हणून षष्ठीला पालखीसोबत आलेल्या हरिजनांचा‌ सत्कार व सन्मान केला जातो.

© सौ अर्चना देशपांडे 

मो.नं‌‌ ९९६०२१९८३६

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी वाटचाल…. मी अजून लढते आहे – 16 ☆ सुश्री शिल्पा मैंदर्गी

सुश्री शिल्पा मैंदर्गी

☆ मनमंजुषेतून ☆ माझी वाटचाल…. मी अजून लढते आहे – 16 ☆ सुश्री शिल्पा मैंदर्गी ☆

सौ.अंजली गोखले 

(पूर्ण अंध असूनही अतिशय उत्साही. साहित्य लेखन तिच्या सांगण्यावरून लिखीत स्वरूपात सौ.अंजली गोखले यांनी ई-अभिव्यक्ती साठी सादर केले आहे.)

आई-वडिलांच्या महती विषयी आपण सगळेच जाणून आहोत. त्यांचे आपल्यावर असलेले ऋण आपण वर्णूच शकत नाही. माझ्या बाबतीतही हेच खरे आहे. मी स्वतःला भाग्यवान समजते की असे आई-बाबा मला लाभले.

माझा जन्म झाल्यानंतर पहिल्या दोन महिन्यातच माझ्या चेहऱ्यावर ती प्रतिसाद न आल्याने आईच्या मनात शंकेची आणि काळजी ची पाल चुकचुकली. त्याच वेळी आजीने मात्र अचूक ओळखले आणि माझ्या दृष्टीमध्ये काहीतरी कमी आहे हे तिला जाणवले. त्यानुसार माझ्यावर योग्य ते उपचार सुरू झाले आणि माझी जास्तच काळजी घेतली जाऊ लागली.

मी जसजशी मोठी होऊ लागले, तोपर्यंत मला काहीच कधीच दिसणार नाही हे सत्य आई-बाबांना नक्की समजून चुकले होते. पण मला दृष्टी नाही म्हणजे मी काहीच करू शकणार नाही असा विचार न करता आईने मला असा विश्वास दिला की मी माझ्या बुद्धीच्या जोरावर आणि इतर अवयवांच्या सहाय्याने सर्वकाही करू शकेन. आपली मुलगी पूर्ण अंध असताना ही तिने मला उभारी दिलीआणि स्वावलंबी बनवले. त्यामुळे मी सर्वसामान्य मुलींसारखे वावरू लागले. मोठे होऊ लागले.

नृत्यांगना म्हणून माझी ओळख झाल्यानंतर कार्यक्रम ठिकठिकाणी होत असताना, ड्रेस अप करणे, हेअर स्टाईल करणे, उत्तम मेकअप करणे, निवडक योग्य असे दागिने घालणे, यामध्ये आई इतकी एक्सपोर्ट झाली की केवळ त्याच मुळे बाहेरून ब्युटीशियन बोलावून मेकअप करून घेण्याची मला गरजच भासली नाही आणि आज पर्यंत आमचे हेच रूटीन सुरू आहे.

जशी आईनं मला साथ दिली तशीच शाळेच्या बाबतीत, अभ्यासामध्ये, नृत्य कलेमध्ये, बाबांनी मला योग्य मार्गदर्शन केले. माझ्या शिक्षणावर डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवले. इतकं की मला एक प्रसंग आठवतो. बाबांची शाळा बारा ते साडेपाच होती. काम जबाबदारीचे होते. शाळेत इन्स्पेक्शन चालू होती आणि माझा नृत्याचा क्लास पाच ते सहा या वेळात होता. मधल्या वेळात वेळ काढून मला क्लासमध्ये सोडण्यासाठी बाबा आले आणि त्यांच्या त्यांच्या वेळी साहेबांपुढे फाईलही हजर केली. खरच किती अवघड होते हे काम.

अशा तऱ्हेने समाजातील इतर दिव्यांग मुलांच्या पालकांसमोर माझ्या आई-बाबांनी आदर्श घालून दिला असे म्हंटले तर ती अतिशयोक्ती होणार नाही.

…. क्रमशः

© सुश्री शिल्पा मैंदर्गी

दूरभाष ०२३३ २२२५२७५

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ विधुर (एक आत्मचिंतन) – भाग 2 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

☆ मनमंजुषेतून ☆ विधुर (एक आत्मचिंतन) – भाग 2 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆ 

नवरा बायकोच्या जोडी तली एकटी बायको राहिली तरी ती घरातल्या काहीना काही कामात रमू शकते. वेळ घालवू शकते. पण विधुर मात्र घरातल्या कामात लुडबूड करू शकत नाही. त्याची कुचंबणाच होते.हल्ली आम्ही जेष्ठ नागरिक असे काही मित्र कोपऱ्यावरच्या बागेत गप्पा मारायला जमतो. आणि वेळ चांगला जातो. पण अलीकडे कोणी ना कोणी गप्पा मारताना तोंड चालवायला काहीतरी आणत असतात. मी घरातल्यांना काही करायला न सांगता, बाहेरच्या बाहेर काहीतरी घेऊन जातो. आणि मग घरी जातानाही सर्वांना घेऊन जातो.

तू खरं तर किती उद्योग करत होतीस. इतकंच नाही तर पै पै करून पैसे साठवत होतीस. का तर म्हातारपणी औषध आणि दवाखान्याला किती लागतील कुणास ठाऊक?असं नेहमी म्हणायचीस. सुजय डॉक्टर  असूनही तुला अस का वाटत होतं काय माहित! सात आठ किलोमीटर अंतरावर त्याचा दवाखाना होता. मला जरा काही झालं की., तू त्याला फोन करून लगेच बोलवायचीस. एकदा त्यांनी तुला सांगितलं की “आई बारीक-सारीक साठी बोलवत जाऊ नको ग दवाखान्यात पेशंट थांबलेले असतात मग गोंधळ होतो” स्वाभिमानी होतीस तू. तब्बेतीसाठी पुन्हा नाही कधी त्याला फोन केलास तू. खरच तुला औषध, उपचार, दवाखाना, डॉक्टर कशाचीच गरज नाही कधी  लागली. झटकन सगळ्यांना सोडून निघून गेलीस. तुझे कष्टाचे पैसे आम्हालाच ठेवून गेलीस. सगळं सगळं आठवत बसतो. आणि बेचैन होतो ग! त्या पैशापेक्षा तू राहिली असतीस तर! पैशापेक्षा तुझी लाख-मोलाची किंमत आज तु नसताना मला पोखरून काढतीय. विधूर‌‌‌ म्हणून मी जीवन कंठतोय.

कितीतरी गोष्टी आठवत बसतो. कितीतरी निर्णयाच्या वेळी माझा नवरेपणाचा अहंकार जागृत व्हायचा. आणि सुनांसमोर लोकांसमोरही मी तुला मापात काढायचो. महिलामंडळासारख्या ठिकाणी अलीकडे कितीतरी स्पर्धांमध्ये तू बक्षीस मिळवून दाखवलीस. अभिनंदनाचा वर्षाव झाला. अभिमान सिनेमातल्या सारखा माझ्या अस्मितेला तडा गेला. तुझ कौतुकही लोकांना सांगायचो. पण ते सांगताना त्यातही कुठतरी मीपणा असायचाच. नवरे पणाचा अहंकार होता तो! एक गोष्ट माझ्या लक्षात यायला हवी होती,  की कोणासमोर तुला मी बोलायला नको होत. तीच गोष्ट एकटं  असताना सांगता आली असती.  तुला खरं तर माणसांची आवड होती. पण तरीही स्वतंत्र संसाराचीही इच्छा होती.पण ती कधीच पूर्ण झाली नाही. हल्ली कधीतरी जवळच्या संबंधातल्या कोणाकडेतरी कार्यक्रमाला जाण्याचा प्रसंग येतो.अनेक जण जोडी जोडीने आलेले पाहिले की माझ्या डाव्या बाजूच मोकळं अस्तित्व मला सलत रहात. सगळे तुझी आठवण काढून ते कौतुक करायला लागले की आठवणींचा कढ येतो. आणि त्या बेचैनीला शब्द नसतात.

छोटा सोन्या नातू आजोबांजवळ आला. आजोबांना भूतकाळातून वर्तमानात आणल त्यांनी. आजोबाना  म्हणाला “डोळे मिटा आजोबा. गंमत दाखवतो. आजोबांनी बंडोपंतानी डोळे मिटले. दोन मिनीटात  सोन्याने आजोबांच्या डोळ्यासमोर फोटो  धरला. आणि “आता उघडा डोळे”. आजीचा आणि तुमचा फोटो!  गंमत आहे की नाही ! हा फोटो मी तुम्हाला दाखवायला आणलाय. छान आहे ना? डोळ्याला थोडे कमी दिसत होते पण तरीही ते फोटो कडे पहात राहिले. अस्ताला निघालेल्या सूर्याचा एक सोनेरी तांबूस किरण फोटोवर पडला. आणि तिन्हीसांजातही तो फोटो त्यांना छान दिसला. आजोबांच्या बंडोपंतांच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य उमटलं. फुलंल आणि खुलल.

समाप्त

©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

बुधगावकर मळा रस्ता, मिरज.

मो. ९४०३५७०९८७

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ विधुर (एक आत्मचिंतन) – भाग 1 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

 ☆ मनमंजुषेतून ☆ विधुर (एक आत्मचिंतन) – भाग 1 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆ 

बंडोपंत आज गॅलरीत आरामखुर्चीत विचारमग्न होऊन शांतपणे बसले होते. नजर शून्यात होती. हे शून्य काय आहे? शून्य तर काहीच नाही. काहीच नाही. मधलं सगळं सगळं पहात बसले होते.

राधा काकू गेल्यापासून बंडोपंत खूपच शांत शांत झाले होते. फारसै कोणाशी बोलत नव्हते. कोणत्याही गोष्टीबद्दल आपली प्रतिक्रिया देत नव्हते. आपलं मतप्रदर्शन करत नव्हते. मूकपणाने निर्विकारपणे घरातल्या सगळ्या घटना त्रयस्थपणे पहात रहायचे.राधा काकूंना जाऊनही आता सहा महिने होऊन गेले. खरंतर सगळं काही मनासारख छान दिसावं असं होत. सुजय डॉक्टर झाला. सुमंत सीए झाला. शिवांगीच लग्न हन तिचा संसार उत्तम चाललाय. काय कमी होत! मोठी उणीव होती. भरुन न निघणारी. एक मोठी पोकळी त्यांना जाणवत होती. आणि त्या पोकळीतल्या शून्यातच ते भूतकाळात गेले. मनाने राधा काकूंशी बोलत राहिले.

आपलं लग्न झालं आणि भरल्या धान्याचे माप ओलांडून तू या घरात आलीस. आणी घराचं रुपडच पालटून गेलं. सरवायची जमीन आणि कौलाच छप्पर असलेल्या आणि अडचणीच्या घरातही न कुरकुरता चार-पाच वर्ष आपण काढली. पण तेही घर फ्लट वाटत होतं.

दिवस जात होते घरातला व्याप बराच होता. आले गेले पाहुणे सगळ्यांना घराचं दार सदैव उघडं होतं. तू मात्र त्या व्यापात बुडून जाऊन हसतमुखानं सगळ्यांचा पाहुणचार आणि स्वागत करत होतीस. इतकंच नव्हे तर हे सगळं करताना प्रत्येकाच्या आवडीनिवडीही पहात होतीस. आणि हे सगळं करत असताना मुलांनाही तू घडवलस. मुलं अभ्यास आणि इतर क्षेत्रातही नावलौकिक मिळवत होती. मी अभिमानाने त्यांचे यश सर्वांना सांगायचो. पण मला मात्र या यशाचा वाटेकरी होता येत नव्हतं. खरोखर त्यांचा अभ्यास इतर स्पर्धा, याबाबत मी कधीच कशात लक्ष घातलं नाही. मी सतत माझ्या मित्र मंडळातल्या कोणाला ना कोणाला जेवायला, चहाला बोलवत असायचो. खरं तर तेव्हा तुला मदत करणं माझं काम होतं. तुझ्या कष्टाची मी कधी कदरच केली नाही. तुझा वाढदिवस असू दे. दिवाळी असुदे.मोठ्या गोष्टींचा किंवा दागिन्यांचा हट्ट तू कधीच केला नाहीस. मोठं खटलं असल्यामुळे परिस्थिती समजून, आहे त्यात समाधान मानत आलीस. अगदी पाणी हवं असलं तरी मी जागेवर बसून मागायचो. खरोखरच मी हाताने कधी चहा केलेलाही मला आठवत नाही. कधी डोकं दुखलं तर मी तुला हक्काने सांगायचो “अगं डोकं दुखतय जरा बाम लावतेस का”? कपाळावरुन तुझा हात फिरला की दुखणं कमी व्हायचं. तुझी तब्येतीची तक्रार कधीच नव्हती. एकदाच तुझं डोकं खूप दुखत होत. मी दाबून द्यायला हव होत. पण बरेच दिवसांनी, जुना मित्र आलाय म्हणून मी निघून गेलो. मला सगळ्या गोष्टींचा पश्चात्ताप होतोय. आता माझं डोकं मी कोणाला चेपायला सांगणार? बाम लावून दे, अस कोणाला सांगणार? चेहऱ्यावर दिसल की कोणीतरी गोळी आणून देतात. त्या गोळीबरोबर तुझ्या हाताचा स्पर्श नसतो. अनेकदा अस होत की, मला सगळ्यांशी खूप बोलायचं असतं. पूर्वीच्या आठवणी सांगाव्याशा वाटतात. गप्पांचा मूड येतो. पण प्रत्येकजण आपापल्या कोशात इतका गुंतलेला असतो की माझं सगळं बोलणं एका शांततेत विरून जात. कधीतरी एखादा पदार्थ खाण्याची इच्छा होते. पण हक्काने कोणाला सांगणार? तुला हक्काने सांगायचो “अगं आजभजी  कर उद्या वडे कर”. पण आता जे काही असेल त्यालाच वडे आणि भजी असच नाव देतो. आणि त्याचाच आस्वाद घेत खातो. तुझ्या हातच्या पुरणपोळीची सर विकतच्या पुरणपोळीला नाही येत ग! तशी पोळी आता मला कधीच नाही मिळणार!

क्रमश:….

©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

बुधगावकर मळा रस्ता, मिरज.

मो. ९४०३५७०९८७

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ बालपणीच्या आठवणी…भाग-4 – खजिना ☆ सौ. अमृता देशपांडे

सौ. अमृता देशपांडे

☆  मनमंजुषेतून ☆ बालपणीच्या आठवणी…भाग-4 – खजिना ☆ सौ. अमृता देशपांडे ☆ 

बाबांची बदली “कद्रा ” येथे झाली. कारवारच्या पुढे काळी नदीच्या पलीकडे कद्रा हे छोटेसे खेडेगाव. गाव म्हणजे आदिवासी जमात आणि जंगल. तिथले सगळे वर्णन बाबा आम्हाला अगदी रंगवून सांगत असत. बाबांनी सांगितलेल्या त्या आठवणी  बाबांच्या शब्दात मांडल्या आहेत.

“मेडिकल ऑफिसर म्हणून माझं पोस्टिंग कद्रा येथे झालं. कद्रा म्हणजे जवळजवळ जंगलच. तेथील एक छोटीशी वस्ती असलेलं गाव. मनुष्यवस्ती अतिशय विरळ. लांब लांब वसलेल्या छोट्या छोट्या घरांची वसाहत. मी व सौ दोघे 2-3 गाड्या बदलून कद्र्याला पोचलो. गावातील लोकांना हे आलेले जोडपे डाॅक्टर आहेत, हे सहज लक्षात आले. जाॅन कपौंडरने दवाखाना दाखवला. एका ब्रिटिशकालीन बंगल्यामध्ये आमच्या रहाण्याचा इंतजाम केला होता. तो बंगला पाहिल्यावर मधुमती सिनेमातील महालाची आठवण झाली. भले मोठे दरवाजे, काचेची तावदाने असलेल्या चौकोनी मोठमोठ्या खिडक्या,  त्यावर अर्धगोलाकार रंगीत काचा, उंच छतावरून लोंबणारे दिवे, हंड्या, मोठाली दालने, अशा भव्य बंगल्यात रहाणार आम्ही दोघे.

पक्ष्यांच्या किलबिलाटाने सकाळी जाग येई. खिडकीतून येणा-या सूर्यकिरणांनी दिवसाची सुरुवात होत असे. सूर्य मावळला की दिवस संपला. घर ते दवाखाना,  दवाखाना ते घर. दुसरे काहीच नाही. इतरही वेळ घालवण्याचे साधन नाही.

आसपास चार घरे सोडली तर इतर सर्व परिसर जंगलच होतं. संध्याकाळ झाली की घराचे दरवाजे,  खिडक्या बंद ठेवा अशा सूचना वस्तीवरच्या लोकांनी दिल्याने दिवसाही खिडक्या  उघडण्याची भीती वाटत होती.

एकदा रविवारी सकाळी जाग आली तेव्हा जरा बाहेर जाऊन चक्कर मारून येऊ या असा विचार मनात आला.  दरवाजा उघडण्यापूर्वीच घाण वास  यायला लागला.  घरात शोधलं, उंदीर मरून पडलाय की काय? काहीच सापडलं नाही.. तेवढ्यात बाहेर घुर्र घुर्र आवाज आला. हळूच खिडकी  किंचितशी उघडून बघतो तर काय? ? बाप रे!

असा मोठ्ठा पिवळा जर्द पट्टेरी ढाण्या वाघाचं धूड व्हरांड्यात पसरलं होतं.  माझी तर बोबडीच वळली. खिडकी आवाज न करता बंद केली  आत जाऊन बसलो. दर दहा पंधरा मिनिटांनी कानोसा घेत होतो.  सगळा दिवस तो तिथेच होता. संध्याकाळ झाली तसा तो निघून गेला. दुस-या दिवशी जाॅनला सांगितलं तेव्हा तो हसायला लागला.  सायेब, अशेच आसता हंय….

एक दिवस कोवळी उन्हे अंगावर घेत व्हरांड्यात बसलो होतो. अचानक एक. कुत्र्याचं छोटुलं , गुबुगुबु पिल्लू शेपूट हलवत आमच्या जवळ आलं. बराच वेळ ते घोटाळत होतं. त्याला बहुतेक भूक लागली असावी असं समजून सौ ने चतकोर भाकरी दिली त्याला. ती खाऊन पिल्लू तिथेच रेंगाळलं. दुस-या दिवशी दार उघडलं तर पिल्लू हजर! दोनच दिवसात पिल्लू आपलंसं वाटू लागलं. आता रोज दोन्ही वेळी त्याची भाकरीची ताटली तयार असे. सौ ने त्याचं नाव ठेवलं “रघुनाथ”.

आता रोजचा वेळ रघुनाथ बरोबर छान जाऊ लागला. जवळपास फिरायला गेलो तरी रघुनाथ सोबत असेच. आम्हाला एक छान सोबती मिळाला.

एक दिवस अचानक रघुनाथ दिसेनासा झाला. दोन दिवस झाले, याचा पत्ताच नाही. मन अस्वस्थ झाले. जाॅनला विचारले,  तेव्हा तो सहजपणे म्हणाला, कुत्रे दिसत नाही,  तर नक्कीच वाघरानं खाऊन टाकलं असणार.

एवढंसं गोड पिल्लू वाघानं खाल्लं असं ऐकून खूप वाईट वाटलं. खूप चुकल्या चुकल्या सारखं वाटलं.  मुक्या प्राण्यांची सवय होते. पुढे नित्य व्यवहारात आठवण कमी होत गेली. कालाय तस्मै नमः II

क्रमशः…

© सौ अमृता देशपांडे

पर्वरी- गोवा

9822176170

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares
image_print