मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी वाटचाल…. मी अजून लढते आहे – 11 ☆ सुश्री शिल्पा मैंदर्गी

सुश्री शिल्पा मैंदर्गी

☆ मनमंजुषेतून ☆ माझी वाटचाल…. मी अजून लढते आहे – 11 ☆ सुश्री शिल्पा मैंदर्गी ☆

माझा भरत नाट्यम् च्या नृत्यातील एम.ए. चा अभ्यास सुरु झाला. ताईनी मला नृत्यातील एक एक धडे द्यायला सुरवात केली. एम. ए.. करताना मला ज्या ज्या अडचणी आल्या.,  त्याचे वर्णन करताना.,  त्या आठवताना माझ्या अंगावर अक्षरशः काटा उभा राहतो आणि आधीच्या आयुष्यात ज्या काही अडचणी आल्या त्याचे काहीच वाटेनासे होते. कारण एम.ए. सारखी उच्चपदवी मिळविण्यासाठी अखंड परिश्रम.,  मेहनत आणि मुख्य म्हणजे एकाग्रता यांची अत्यंत गरज असते. त्यावेळी माझा हा अवघड अभ्यास सुरु असताना माझ्या आई बाबांच्या वृद्धापकाळामुळे.,  वयोमाना प्रमाणे खालावणारी प्रकृति.,  त्यांच्या तब्येतीत होणारे चढउतार यामुने मी खूप अस्वस्थ आणि अस्थिर होऊन गेले होते.

त्यावेळी माझ्या भावाने मिरज – सांगलीच्या मध्यावर असणाऱ्या विजयनगर या भागामध्ये घर बांधले होते. त्याचवेळी माझ्या आईच्या डोळ्याचे ऑपरेशन झाले होते. त्यामुळे आम्हा तिघांनाही तो तिकडे घेऊन गेला होता. पण माझा नृत्याचा क्लास मिरजेत असल्यामुळे मला तिकडून ये- जा करावी लागत असे. शक्यतो माझा भाऊ मला कार मधून सोडत असे पण ज्यावेळी कामामध्ये तो व्यस्त असे त्यावेळी बाबा वडाप रिक्षाने मला सोडत असत. नेमका त्याच वेळी बाबांचा पार्किसन्स चा विकार विकोपाला गेला होता. पण मी एम.ए. करावे ही त्यांची जबरदस्त इच्छा होती. त्यामुळे कोणत्याही अडचणीना आम्ही कोणीच दाद देत नव्हतो.

वडाप रिक्षाची वाट पाहात आम्ही जेव्हा उभे असू त्यावेळी आम्हाला बरेचदा रहदारीचा रस्ता क्रॉस करून जावे लागत असे.त्या रस्त्यावरून दोन्ही बाजूंनी भरधाव धावणाऱ्या गाड्या सुसाट धावत असत.त्यामुळे आम्ही ही जीव एकवटून रस्ता ओलांडत असू.त्यावेळी मला बाबांच्या हाताची थरथर जाणवत होती आणि चालताना ही त्यांना होणारे परिश्रम समजून येत होते.पण ते कोणतीही तक्रार न करता माझ्यासाठी भर दुपारी येत होते.त्यांच्या जिद्दीचे पाठबळ होते म्हणूनच तर सगळे जमू शकले.

नृत्याच्या प्रात्यक्षिकाचे मार्गदर्शन सुरू झाले होते.पण आता प्रश्न होता तो थिअरी चा.एम ए च्या अभ्यासासाठी., भारतीय नृत्यांच्या अभ्यासाबरोबर तत्त्वज्ञान या सारखा किचकट विषय होता.अशा एकूण प्रत्येक वर्षी चार पेपर्स चा अभ्यास मला करायचा होता.आता मोठा प्रश्न होता तो वाचनाचा.मला., मी अंदमानला जाऊन आल्यावर., ज्यांनी माझी मुलाखत घेतली होती., त्या सौ अंजली  ताई गोखले यांची आठवण झाली.आणि मी त्यांना  फोन केला.त्यांनी मला वाचून दाखवायला सहज आनंदाने होकार दिला.अशारितीने माझा तोही प्रश्न सुटला.ताईंनी त्यांच्या एमएच्या काही नोट्स मला वाचण्यासाठी दिल्या होत्या.त्याव्यतिरिक्त खरे मंदिर वाचनालय यामधून संदर्भग्रंथ आम्ही मिळवले होते.अशा तऱ्हेने एम एच या अभ्यासाचे रुटीन छान बसले.

…. क्रमशः

© सुश्री शिल्पा मैंदर्गी

दूरभाष ०२३३ २२२५२७५

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ भूदान चळवळ…. ☆ सौ. अमृता देशपांडे

सौ. अमृता देशपांडे

स्व विनायक नरहरी भावे ( आचार्य विनोबा भावे)

Vinobabhaveji.jpg

(जन्म –  11 सितम्बर 1895 मृत्यु – 15 नवम्बर 1982)

☆ मनमंजुषेतून ☆ भूदान चळवळ…. ☆ सौ. अमृता देशपांडे ☆ 

प.पू. आचार्य विनोबा भावे व भूदान पदयात्रा

प.पू. विनोबा भावे यांचे कार्य हे एखाद्या संताप्रमाणे दीपस्तंभासारखे आहे. वयाच्या दहाव्या वर्षी त्यांनी निःस्वार्थी सेवेची शपथ घेतली. आध्यात्मिक सत्य व नित्य व्यवहारातील  कर्मे व कर्तव्ये यांचा सुंदर संगम असलेल्या महात्मा गांधींच्या व्यक्तिमत्वाने ते प्रभावित झाले. क्रियाशून्य व सुस्त अशा कमजोर समाजात नवचैतन्य आणणे व सत्य,  अहिंसेच्या मार्गाने स्वातंत्र्य मिळवणे या गांधीजींच्या कार्याबद्धल विनोबाजींनी एके ठिकाणी म्हटले आहे,  ” महात्मा गांधींच्या रूपात मी हिमालयातील शांती व क्रांतीकारी शक्ती  अनुभवली. शांतीद्वारे क्रांती आणि क्रांती द्वारे शांती रा दोन्हींचा मिलाफ मी त्यांच्याकडे पाहिला.”  तर महात्मा गांधीनी विनोबाजींच्या वडिलांना लिहिलेल्या पत्रात ते.म्हणतात,  ” इतक्या कोवळ्या वयात विनोबांनी जी आध्यात्मिक पातळी गाठली आहे,  ती उंची गाठण्यासाठी मला परिश्रम व सहनशक्ती ची पराकाष्ठा करून आयुष्यातली अनेक वर्षे खर्ची घालावी लागली आहेत.”

अशी ही गुरूशिष्याची जोडी.  1940 साली अहिंसक मार्गाने चळवळ करण्यासाठी महात्मा गांधीनी पहिला सत्याग्रही म्हणून विनोबाजींची निवड केली

सत्य,  अहिंसा व प्रेमाची विश्व व्यापक शक्ती या मूल्यांवर असलेला ठाम विश्वास,  या तत्वांशी असलेली वचनबध्दता  या गुणांमुळे त्यांचे संतस्वरूप निश्चितच वेगळे होते.  मनाचे आंतरिक सौंदर्य म्हणजे विचार  व बाह्य सौंदर्य म्हणजे आचरण यांचा अलौकिक परिपोष म्हणजे पू. विनोबाजींचे जीवन.

स्वातंत्र्यानंतरही पूर्वापार चालत आलेली भारतीय भूमि समस्या कायमच होती. जमीनदार आणि भूमिहीन यांच्यात प्रचंड आर्थिक दरी होती.तेलंगणामध्ये समानता आणण्याच्या कव्पनेने कम्युनिस्टांनी हिंसक मार्गाने चळवळ उभी केली होती. शासन कायद्याने त्याचा प्रतिबंध करू पहात होते. ‘ कत्ल किंवा कानून’ हे मार्ग भूमि समस्या सोडविण्यासाठी उपायकारक ठरणार नाहीत. त्यासाठी करूणेचा शाश्वत मार्ग शोधावा लागेल असे आचार्य विनोबांचे चिंतन होते.  त्यातून भूमीदान यज्ञाचा प्रारंभ झाला.

जगात विनोबाजींचे भूदान कार्य इतिहासात अभूतपूर्व मानलं जातं.  विनोबाजींनी भारतभर पदयात्रा केली.

श्रीमंत जमीनदारांनी आपल्या जमिनीला काही भाग भूमिहीनांना स्वेच्छेने दान करणे हे भूदान चळवळी चे मुख्य आणि एकमेव ध्येय होते. अशा मिळालेल्या जमिनी भूमिहीनांना वास्तव्यासाठी व पीक उत्पादनासाठी वापरून त्यावर आपल्या कुटुंबाची उपजीविका करावी हा हेतू होता. अशाप्रकारे कष्टकरी वर्ग गाव सोडून रोजीरोटीसाठी इकडेतिकडे न जाता गावातच रहावा व त्यांच्या कामाची मदत धनवान शेतक-यांना व जमीनदारांना व्हावी, तसेच मोबदल्यात मिळालेलं धन गरीब शेतक-याना मिळावे व अशा रितीने गावातील धन गावातच रहावे हा उद्देश.  अशी दानात मिळालेली जमीन विकता येत नसे. जमीनदारांनी आपल्या जमिनीचा तुकडा आपल्याच भूमिहीन बांधवांना दान करावा,  म्हणून ही भूदान चळवळ.

चित्र साभार >> – विनोबा भावे – विकिपीडिया (wikipedia.org)

© सौ अमृता देशपांडे

पर्वरी- गोवा

9822176170

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “ते” होते म्हणून ☆ सुश्री राजलक्ष्मी देशपांडे 

सुश्री राजलक्ष्मी देशपांडे

☆ मनमंजुषेतून ☆ “ते” होते म्हणून ☆ सुश्री राजलक्ष्मी देशपांडे 

आई म्हणायची, “आण्णा कर्वे, म. फुले आगरकर होते, न्या. रानडे होते म्हणून तू आणि मी इतकं छान जगतो आहोत. नाहीतर स्वयंपाकघर आणि माजघरापलिकडे जग नसतं आपलं.” हे आठवलं की अनेक नावं आठवतात आणि “ते होते म्हणून” असं त्यांच्याबद्दल म्हणावंसं वाटतं.

त्यापैकी एक स्वामी दयानंद सरस्वती.

आर्य समाजाचे संस्थापक. शाळेत असताना दयानंद सरस्वती हा एक मार्काचा प्रश्न असायचा. दयानंद सरस्वती आणि आर्य समाज ही जोडी जुळलेली की झालं! तिसरीत असताना शंकराच्या पिंडीवर नाचणारा उंदीर बघून त्यांचा मूर्तीपूजेवरचा विश्वास कसा उडाला, हा धडा होता. तो शिकवताना माझा मूर्तीपूजेवरचा विश्वास बिलकुल उडू नये आणि त्याचवेळी दयानंदांबद्दल आदर मनात राहील याची काळजी घरी वडिलांनी घेतली होती. पुढे पुण्याच्या ज्ञानप्रबोधिनीमधे दयानंदांवर संशोधन केलं गेलं आणि या व्यक्तिमत्वानं मी भारून गेले.

गुजरातमध्ये ब्राह्मण कुटुंबात जन्मलेल्या दयानंदांचा मूर्तीपूजेवरचा विश्वास उडाला आणि खऱ्या ईश्वराच्या शोधात ते घरातून बाहेर पडले. अत्यंत ज्ञानी संन्यासी गुरुंकडून त्यांनी वेदांचा सखोल अभ्यास केला.

त्या काळी मॅक्समुल्लर या जर्मन पंडिताने ५०वर्षांच्या कष्टाने प्रथम ऋग्वेदाची लिखित प्रत बनवली होती. त्यांना या संस्कृतीबद्दल आदर होता. पण पूर्ण ज्ञान नव्हतं. पाणिनीच्या व्याकरणाचे नियम लावून त्यांनी वेदांचा अर्थ लावला आणि त्यांना “मेंढपाळांची गाणी” म्हटलं. काही हिंदू पंडितांनीही वेदांचा चमत्कारिक अर्थ लावला होता. पण मुळात वेदांचा व्याकरण वेगळं आहे. त्याला “निरुक्त” म्हणतात. त्याच्या आधाराने वेदांचा अर्थ लावून त्यातील उदात्त,  विश्ववंद्य विचारांची ओळख दयानंदांनी समाजाला करून दिली आणि वेदांना प्रतिष्ठा मिळवून दिली. ही त्या काळाची गरज होती. कारण ख्रिश्चनांच्या सुटसुटीत, फारशी कर्मकांड नसलेला,  भेदभाव विरहित धर्म लोकांना आवडू लागला होता. मुस्लिमांचा एकेश्वरवाद आणि मूर्तीपूजा न मानणं पटू लागलं होतं. हिंदू लोक मोठ्या प्रमाणात धर्मांतर करीत होते. ‌याचे दोन परिणाम झाले असते.

एक… राजकीय! ख्रिश्चन धर्म आवडला की ब्रिटिशांची गुलामगिरी जाचण्याचं कारण नाही. पारतंत्र्य, आपल्यावरचा अन्याय, देशाची आर्थिक लूट. . काहीच झालं नसतं. “राष्ट्र” म्हणून आपण संपलो असतो. पूर्ण राजस्थानात इस्लाम धर्माची छाया होती. तिथल्या आदिवासी जमातीत आपल्या मुली मुस्लिमांना द्यायची प्रथा होती. ही प्रथा दयानंदांमुळे बंद झाली. अन्यथा फाळणीच्या वेळी राजस्थान पाकिस्तानात गेला असता.

दुसरं म्हणजे… एक पूर्ण विचारधाराच नष्ट झाली असती. वेदांमधील भूमिती, शून्याचा शोध,  विज्ञान, पशुविज्ञान,  वृक्षायुर्वेद,  आयुर्वेद,  राज्यशास्त्र,  समाजशास्त्र, काव्य,  जीवनविषयक तत्त्वज्ञान.. जे पूर्ण सृष्टीतील चैतन्याचा शोध घेतं… फक्त मूर्ती रुपातील देवतेचा नाही.. हे सगळं कालौघात विसरलं असतं. म्हणून हिंदू धर्मात मुळात एकेश्वरवाद आहे, मूर्तीपूजेचं अवडंबर नाही. जातिव्यवस्था नाही, तर गुणांनुसार व्यवसायाच्या संधी आहेत (aptitude नुसार…) हे सारं दयानंदांनी पटवून दिलं आणि वेदांचा व धर्माचा ऱ्हास थांबवला. त्यांनी या व्यतिरिक्त खूप कामं केली. त्यांच्याबद्दल पुढच्या लेखात!!

 

© सुश्री राजलक्ष्मी देशपांडे

मो – 7499729209

(लेखात व्यक्त केलेली मते लेखकाची वैयक्तिक मत आहेत.)

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून☆ 2020 – 2021 – हरवलं….गवसल…. ☆ सौ. अमृता देशपांडे

सौ. अमृता देशपांडे

☆ मनमंजुषेतून ☆2020 – 2021 – हरवलं….गवसल…. ☆ सौ. अमृता देशपांडे ☆ 

2020….. या वर्षी हरवले: 

खूप जवळची माणसे, मनःशांती,  मुक्त वावर, मंदिरातून देवदर्शन,  प्रवास, भेटीगाठी, असं खूप खूप..

हाती राहिलं:

भीती, सावधपणा, अलिप्तता,  उदासी.

हरवलेलं मिळालं:

  • -स्वच्छतेचे, आत्मनिर्भरतेचे आणि कुटुंब व्यवस्थेवर ठाम उभ्या असलेल्या आपल्या भारतीय संस्कृतीचे आचारविचारांचे संस्कार.
  • आपल्यातलेच  हरवलेले, विसरलेले, दुर्लक्षित केलेले कलागुण .

नवीन मिळालं:

विश्वासाठी प्रार्थना करण्याची इच्छा, रक्ताच्या एका थेंबाची किंमत, एका श्वासाची किंमत, आणि आपल्या माणसाच्या अस्तित्वाची किंमत आणि अनमोल असा ई-अभिव्यक्ती चा सहवास.

सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद.  संपादक मंडळाचे आभार.

सर्व लेखक- लेखिका, कवी- कवयित्री ना 2021 च्या शुभेच्छा!

2021 सर्वांना मनसोक्त लेखनाचे, आनंदाचे, आरोग्याचे व सुरक्षिततेचे असो.  हीच सदिच्छा!!

 

© सौ अमृता देशपांडे

पर्वरी- गोवा

9822176170

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ प्रकाश ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे

सौ.ज्योत्स्ना तानवडे

☆ मनमंजुषेतून ☆ प्रकाश ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆ 

प्रकाश हा अखंड उर्जास्त्रोत आहे. चैतन्याचा झरा आहे. ज्ञानाचा दीपक आहे. आपल्या सभोवतीचा प्रकाश हा आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग असतो. त्यामुळे त्याचे वेगळे अस्तित्व जाणवतही नाही.

आपल्याला सहसा अंधाराचा सामना करायची वेळच येत नाही. त्यामुळे संध्याकाळी प्रकाश कमी झाला की आपण उदास होतो. ती वेळ ‘कातरवेळ’ असते. तसेच ढगाने सूर्य झाकला गेला की अंधारते. आपण बेचैन होतो. मळभ दाटून आले म्हणतो. त्यामुळे पूर्ण अंधाराची आपण कल्पनाच करू शकत नाही.

आम्ही दोघे पती-पत्नी १३-१४ वर्षे एका नेत्रपेढीसाठी ‘नेत्रमित्र’ म्हणून काम करत होतो. त्यावेळी अंधत्वाचे विविध पैलू लक्षात आले. दृष्टिदान संकल्पने विषयी अज्ञान, गैरसमज, अपुरी माहिती या गोष्टी विशेषत्वाने लक्षात आल्या. पण प्रकाशाचे महत्त्व जास्ती लक्षात आले ते एका खास कार्यक्रमात‌.

एका वर्षी जागतिक दृष्टिदान दिवसाच्या निमित्ताने नेत्रदानातून दृष्टीलाभ झालेल्या तीन जणांची मुलाखत घेण्याची संधी मला मिळाली.

त्यांना समक्ष भेटल्यावर त्यांच्या चेहर्‍यावरील आनंदच त्यांच्या भावना सांगत होता. एक वीस-बावीस वर्षांची विवाहित मुलगी स्वतःच्या मुलाला डोळ्यांनी प्रत्यक्ष बघता येते हीच सर्वात मोठी आनंदाची गोष्ट आहे हे सांगताना रडू आवरू शकत नव्हती. एक पन्नाशीच्या बाई आणि ६५ वर्षांचे आजोबा हे खूप भारावले होते. घरातली स्वतःची कामे स्वतः करणे, स्वयंपाक करणे, एकटे फिरायला जाणे, बाजारहाट, बँकेतली कामं या सर्व गरजेच्या गोष्टी स्वतः करताना मिळणारा आनंद शब्दांबरोबर त्यांच्या चेहर्‍यावरून ओसंडत होता. आपल्या दृष्टीने किती क्षुल्लक कामे, पण त्यासाठी त्यांना परावलंबित्व आले होते. थोडक्यात निरुपयोगीपणाची अगतिक भावना त्यांच्या मनातून आता दूर झाली होती.

त्यांच्याबरोबर आम्हा सर्वांना पण समाधानाचा आनंद मिळाला होता आणि मन वेगळ्याच प्रकाशाने भरून गेले होते. आम्ही आमच्या कुटुंबातील पाच जणांचे नेत्रदान करवून त्यांच्या जगण्याची सफल सांगता करताना या कार्यात आपला खारीचा वाटा उचलला आहे आणि अमूल्य समाधानाचे वाटेकरी झालो आहोत.

आपले आयुष्य आनंदात घालवल्यानंतर आपल्या पश्चात आयुष्याचे  सार्थक करण्याचा नेत्रदान हा अतिशय महत्त्वाचा सोपा उपाय आहे. त्यामुळे दोन अंधांची आयुष्य प्रकाशमान होतात. त्यासाठी नेत्रदाना बाबत जागरूक असायला हवे. आपण तर नेत्रदानाचा संकल्प करायचाच पण जवळपास, ओळखीत कुणाचा मृत्यू झाला तर अगदी शांतपणे त्यांच्या जवळच्या व्यक्तींना नेत्रदाना विषयी सुचवायचे. कारण दु:खामुळे त्या व्यक्तींच्या लक्षात ही गोष्ट येईलच असे नाही. तेव्हा अशी जागृती करीत प्रत्येक जण नेत्रमित्र बनू शकतो.

आपल्याला मनुष्य जन्म मिळाला. त्याचा आनंदाने उपभोग घेतला. आपल्या पश्चात या छोट्या कृतीने आपण आनंद वाटू शकतो. मग काय हरकत आहे. हीच आपल्या माणुसपणाची जाणीव जागृती आहे.

 

© सौ. ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ || देवत्व || ☆ सुश्री मनीषा कुलकर्णी

☆ मनमंजुषेतून ☆ || देवत्व || ☆ सुश्री मनीषा कुलकर्णी ☆ 

? || देवत्व || ?

 दिव्यत्वाची जेथ प्रचिती | तेथे कर माझे जुळती ||

१९४७ मधली गोष्ट..! डाॅ .आर्. एच्. कुलकर्णी नामक २२ वर्षाच्या तरूणाला महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर असलेल्या चंदगढ़ गावी दवाखान्यात नोकरी मिळाली. दवाखान्यात तुरळक पेशंटस् असायचे…!

तो जुलै महिना होता. रात्री तुफान पाऊस पडत होता. डॉक्टरांचा दरवाजा कोणीतरी जोरजोराने वाजवत होतं. बाहेर दोन गाड्या घोंगडी पांघरलेली, हातात लाठ्या-काठ्या घेतलेली सात-आठ माणसं उभी होती.. काही कळायच्या आतच त्यांना गाडीत ढकलण्यात आलं. सुमारे दीड एक तासाच्या प्रवासानंतर गाडी थांबली. काळाकुट्ट अंधार..! लाठीधार्‍यांनी डाॅक्टरना एका खोलीत ढकललं. खोलीत एक चिमणी मिणमिणत होती. खाटेवर एक तरुण मुलगी.. बाजूला एक म्हातारी स्त्री बसली होती…!

डाॅक्टरांना तिचं बाळंतपण करण्यासाठी फर्मावण्यात आलं. ती मुलगी म्हणाली, “डाॅक्टर.. मला जगायचं नाही. माझे पिताजी खूप श्रीमंत जमिनदार आहेत. मी मुलगी असल्यामुळे मला शाळेत पाठवलं नाही. घरी शिकवायला एक शिक्षक ठेवला. मला या नरकात ढकलून तो पळून गेला. गावाच्या बाहेर या घरात या दाईबरोबर मला गुपचूप ठेवण्यात आलं आहे.. त्या मुलीनं एका कन्येला जन्म दिला पण बाळ रडलं नाही. ती म्हणाली, “मुलगीच आहे नां.. मरू दे तिला माझ्यासारखे भोग तीच्या नशिबी येतील…!”

डाॅक्टरांनी आपल्या ज्ञानाचा व कौशल्याचा वापर करून बाळाला रडायला लावले. डाॅक्टर बाहेर येताच त्यांना १००रु. देण्यात आले.. त्याकाळी ही रक्कम मोठी होती. आपलं सामान घेण्याच्या निमित्ताने डाॅक्टर खोलीत आले.. त्या मुलीच्या हातावर शंभराची नोट ठेवत म्हणाले, ” आक्का.. आपल्या किंवा मुलीच्या जीवाचं बरंवाईट करून घेऊ नको. संधि मिळेल तेव्हा पुण्याच्या नर्सिंग काॅलेजला जा. आपटे नावाच्या माझ्या मित्राला डाॅ. आर्. एच्. कुलकर्णींनी पाठवलंय असं सांग.. ते तुला नक्की मदत करतील. ही भावाची विनंती समज…! ”

पुढे डॉक्टरांनी स्त्री-प्रसूती विषयात विशेष प्राविण्य मिळवले. अनेक वर्षांनंतर औरंगाबादला एका काँन्फरन्स्ला ते गेले असता अत्यंत उत्साही आणि तडफदार अशा डाॅ.चंद्राच्या भाषणानी ते खूप प्रभावित झाले.. डाॅक्टर चंद्राशी बोलत असताना कोणीतरी त्यांना अदबीने ” डाॅ.आर्.एच्.कुलकर्णी सर.. “अशी हाक मारली.. हे ऐकताच डाॅ. चंद्रानं चमकून डॉक्टरांकडे पाहिलं आणि म्हणाली, “सर.. तुम्ही कधी चंदगढ़ला होता कां..?” “हो.. पण बरीच वर्ष झाली या गोष्टीला बेटा..”

डोळ्यांत टचकन् पाणी आलं.. स्वतःला सावरत ती म्हणाली, ” तर मग तुम्हाला माझ्या घरी यावंच लागेल…!”

” डाॅ.चंद्रा.. मी तुला आज पहिल्यांदाच बघतोय.. तुझं भाषण खूप आवडलं म्हणून तुझं कौतुक करायला भेटलो.. असं अचानक घरी यायचं म्हणजे..” “सर please…” “आई.. बघितलंस काम कोण आलंय ते..?”

डाॅ. चंद्राच्या आईने क्षणभरंच पाहिलं आणि डाॅक्टरांचे पायच धरले.. ” डॉक्टर.. तुमच्या सांगण्यावरून मी पुण्याला गेले.. आपटेंना भेटले.. स्टाफ नर्स झाले.. माझ्या मुलीला मी खूप शिकवलं.. तुमचा आदर्श ठेवून तीला स्त्री विशेषज्ञ डाॅक्टर बनवलं…! ”

आता आश्चर्यचकित व्हायची वेळ डाॅक्टरांची होती. ” चंद्रा.. बेटा तू मला कसं ओळखलंस..? ”

“तुमच्या नावामुळे.. सतत जप चाललेला असतो आईचा..” ” तुमचं नाव रामचंद्र म्हणून हिचं नाव चंद्रा ठेवलं..  तुम्हीच आम्हाला जीवदान दिलंय.. तुमचाच आदर्श ठेवून चंद्रा गरीब स्त्रियांना निःशुल्क तपासते…!”

डाॅ. आर्. एच्. कुलकर्णी म्हणजे सामाजिक कार्यकर्त्या.. सुप्रसिद्ध लेखिका.. इन्फोसिसच्या सर्वेसर्वा. असलेल्या सुधा मूर्तींचे वडील…!

तुझ्यामाझ्या जड देही …| देव भरोनिया राही … || 

© सुश्री मनीषा कुलकर्णी

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून☆ मावळण ☆ सौ. अमृता देशपांडे

सौ. अमृता देशपांडे

☆ मनमंजुषेतून ☆ मावळण ☆ सौ. अमृता देशपांडे ☆ 

1953-54 ची ऐकिवात आठवण.  वडील वयस्क आणि आई देवाघरी गेलेली. पाठोपाठची 11 भावंडे. सगळ्यात धाकटी 2 वर्षाची . बाकी सगळी 2-3 वर्षांनी मोठी, एकमेकांच्यात. जमीन जुमला फक्त नावावर. मोठ्ठे घर असले तरी या कुटुंबाला एक कोपरा. अशा परिस्थितीत खायचे वांधे, तिथे मुलांचे लाड ते कसले?

परिस्थितीनं मुलांना वयापेक्षा खूप मोठ्ठं केलं होतं. सगळीचजणं समंजस.  कसला हट्ट नाही,  कसलेही मागणे नाही.  जे असेल त्यात आनंद मानणे.

दिवस सरत होते.  सणवार येत आणि जात. ही सगळी भावंडे दिवाळी ला गोडधोड,  फराळ, फटाके याची इच्छा न धरता, आनंदाने दिवाळी साजरी करायचे. कशी? तर सुंदर सुंदर रांगोळ्या काढून..त्यातच इतके मग्न होत कि, दुस-या कशाचेच भान नसे. देवानं कलेचं वरदान दिलं होतं प्रत्येकाला.

काळ पुढे सरकला. परिस्थिती ही हळूहळू सुधारली. शिक्षणं चालू होती. 1955- 1960, त्या काळी मॅट्रीक पास हे शिक्षणाचं लिमिट होतं मुलींसाठी. ते झालं की लग्न.

कोल्हापूर सोडून सासरी जाणे..अशाप्रकारे चौघीजणी सासरी पुण्यात पोचल्या. सासरी गेलेली, दुधात साखर विरघळावी तशी सासरी माणसांत मिसळून जायची.  आणि तसंच झालं पाहिजे,  हा अलिखित नियम आणि हेच संस्कार.

ही पण अगदी लवकर संसारात रमली. घरी सासू सासरे, दीर असं एकत्र कुटुंब. नंतर तेही वाढत गेलं. जावा आल्या.  मुलं झाली. मिस्टर एकटेच कमावते. पण ही झाशीची राणी.  घर सांभाळून अंगी असलेल्या कलागुणांची मदत घेत कलावस्तु करून विकणे,  गरजूंना जेवणाचे डबे देणे, अशा मार्गांनी आर्थिक बाजू पण उचलून धरत होती. तेही अगदी आनंदाने. सास-यांना तिचं खूप कौतुक वाटत होतं.

संसारवेलीवर चार गुलाब एकापाठोपाठ एक फुलले.जणु रघुवंशाचे चार सुपुत्र.

आर्थिक परिस्थिती गडगंज नसली तरी समाधानकारक झाली. ती पण कष्ट घेत होती.  कष्ट करणा-याचे हलाखीचे दिवस जास्त टिकत नाहीत.  पण एका शब्दानं माहेरी चुगली केली नाही.

ती माझी आत्या.  आम्ही आते-मामे भावंडे कधी सुट्टीत एकत्र खेळायचो.  हळूहळू अभ्यासात मग्न झालो,  जाणं येणं कमी झालं. त्यावेळी मोबाइल सोडाच, साने फोनही घरोघरी नव्हते.त्यामुळे संपर्क नव्हता.

माझ्या लग्नाच्या दिवशी आली होती,  माझी तिची भेट झाली नाही. नंतर खूप दिवसांनी फोटो बघितल्यावर कळलं.

जवळजवळ 38-40 वर्षांनी तिला भेटायचा योग आला. तिला नुकतंच 90वं वर्ष लागलं होतं. मुलं छान शिकून मोठ्या पदावर काम करत होती. सुना आल्या. नातवंडे झाली.  मागच्या वर्षी नातवाचं लग्न झालं. काकांना जाऊनही बरीच वर्षे झाली.

मी येते असं फोनवर सांगितल्यावर बाल्कनीत वाट  बघत होती.  मी गेल्यावर   तिला नमस्कार केला.  तिनं मला घट्ट मिठीत घेतलं. खरंतर माझा जन्म झाला तेव्हा ती लग्न होऊन सासरी गेली होती.  नंतर तीनचार वेळाच भेटलो असू. आज तिच्या मिठीत खूपकाही हरवलेलं सापडलं होतं.  दोघींचंही बालपण आणि माहेरपण.

खूप गप्पा मारल्या.  नव्वदाव्या वर्षी स्वतः केलेल्या थालिपीठ आणि चहाचा आग्रह करत होती.  भेटून पोट भरलं होतं.  चहाचा घोटन् घोट तिच्या काळजातल्या प्रेमानं गोड गोड लागत होता.

बोलता बोलता मुलांच्या प्रगतीचा अभिमान तिच्या शब्दाशब्दांमधून  जाणवत होता. सुना कशा छान आहेत, नातवंडांचं कौतुक करताना मोहरून गेली होती.

माझी निघण्याची वेळ झाली.  थांब थांब म्हणत अर्धा तास गेला. पुढच्या वेळी रहायला येते असं सांगून    जड अंतःकरणाने निघाले. मनाशी ठरंवलं पुढच्या वेळी नक्की दोन दिवस तिच्या बरोबरच रहायचं. तीनच महिने झाले तिला भेटून.

एका दुपारी तिच्या मुलाचा फोन आला. ” आई गेली”.

मन सुन्न झालं.  तो दिवस चैत्र शुद्ध तृतीयेचा. 13 वर्षांपूर्वी माझे बाबा याच दिवशी गेले.त्यांच्या पाठची ही बहीण.  त्याच तिथीला गेली. योगायोग…….

रात्री मी आतेभावाला फोन केला.  इतक्या दुरून मी फक्त शब्दानीच धीर देऊ शकत होते.

बोलताना तो म्हणाला, ” आता कसं करायचं बघू, कारण आईनं तिची इच्छा सांगितली होती की मी गेल्यावर माझ्या अस्थी कोल्हापूर ला पंचगंगेत विसर्जित करा, म्हणून. “मला हुंदका आवरेना.

आमच्या कोल्हापूर भागात माहेरवाशिणीला ” मावळण” म्हणतात. लग्न होऊन सासरी नांदणा-या लेकी, बहिणी जेव्हा गौरीच्या सणाला, सुट्टीला माहेरी येतात तेव्हा”मावळण केव्हा आली? कशी हाईस पोरी? म्हणून प्रेमानं, आपुलकीने आणि मानानं विचारपूस करतात.

आत्यानं मनाशी ठरंवलंच होतं की काय , इथून आता निघायचं ते माहेरी जायचं.

 

अशी ही मावळण.

आयुष्य भर संसारासाठी

पुण्यभूमित राहिली..

चैत्र गौरीच्या तीजेला

परत निघाली…

जणु भेटण्या माहेरा

आतुर मावळण

पंचगंगी समर्पित झाली……

 

© सौ अमृता देशपांडे

पर्वरी- गोवा

9822176170

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी वाटचाल…. मी अजून लढते आहे – 10 ☆ सुश्री शिल्पा मैंदर्गी

सुश्री शिल्पा मैंदर्गी

☆ मनमंजुषेतून ☆ माझी वाटचाल…. मी अजून लढते आहे – 10 ☆ सुश्री शिल्पा मैंदर्गी ☆

(पूर्ण अंध असूनही अतिशय उत्साही. साहित्य लेखन तिच्या सांगण्यावरून लिखीत स्वरूपात सौ.अंजली गोखले यांनी ई-अभिव्यक्ती साठी सादर केले आहे.)

अंदमानच्या त्या रमणीय प्रवासाने माझ्या नृत्याच्या क्षेत्रात आणि माझ्या आयुष्यातही मानाचा शिरपेच खोचला गेला. अंदमान हून परतल्यानंतर मला ठिकठिकाणी नृत्याच्या कार्यक्रमासाठी आमंत्रणे येऊ लागली. अनेक छोट्यामोठ्या ठिकाणी अगदी गल्लीबोळातून सुद्धा मी माझे नृत्याचे कार्यक्रम सादर केले आणि माझ्या परीने सावरकर विचार जनमानसापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला. माझी ती झेप आणि प्रयत्न खारुटीचा असला तरी माझ्या आणि रसिक प्रेक्षकांच्या मनात आनंद निर्माण करणारा होता. माझ्या या जिद्दीची दखल मिरजकर यांनी सुद्धा घेतली आणि 2011 च्या डिसेंबर महिन्यात झालेल्या मिरज महोत्सवांमध्ये “मिरज भूषण” हा पुरस्कार देऊन मला सन्मानित केले.

अपंग सेवा केंद्राच्या संस्थेने मला “जीवन गौरव” हा पुरस्कार देऊन पुरस्कृत केले. मी शिकत असलेल्या कन्या महाविद्यालयात “मातोश्री” हा पुरस्कार देऊन माझ्या विशेष सन्मान केला.

माझा नृत्याचा हा सुवर्णकाळ सुरू असताना माझ्या गुरु धनश्री ताई यांच्या मनामध्ये वेगळाच विचार सुरू होता. त्यांना केवळ एवढ्यातच मला समाधानी ठेवायचे नव्हते. त्यांचा विचार ऐकून मला केशवसुतांच्या कवितेच्या ओळी आठवल्या, “खादाड असे माझी भूक, चकोराने मला न सुख कूपातील मी नच मंडूक, मनास माझ्या कुंपण पडणे अगदी न मला हे  साहे. ”

आणि ताईनी मला भरत नाट्य घेऊन एम ए करण्याविषयी चा विचार माझ्यासमोर मांडला. ज्याला मी सहजच होकार दिला. कारण ताईंना अगदी प्राथमिक स्वरूपातली आणि नृत्याच्या वर्गात छंद म्हणून नृत्य करणारी मुलगी नको होती तर त्यांना माझ्यातून एक प्रगल्भ, परिपक्व आणि विकसित झालेली नर्तिका हवी होती कि जिच्या माध्यमातून भारतीय शास्त्रीय नृत्य “भरतनाट्यम” या प्रकाराचा प्रचार आणि प्रसार योग्यरीतीने सर्वत्र केला जावा.

ताइनी केवळ प्रेक्षकांचा प्रतिसाद आणि स्वतःच्या मनावर अवलंबून न राहता त्यांनी माझे नृत्य त्यांच्या गुरु सुचेता चाफेकर आणि नृत्यातील सहकारी वर्ग यांच्यासमोर सादर करून, त्यांच्याकडून पोच पावती मिळवली आणि मला एम ए करण्यासाठी हिरवा कंदील मिळाला.

…. क्रमशः

© सुश्री शिल्पा मैंदर्गी

दूरभाष ०२३३ २२२५२७५

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ उडणारी म्हातारी ☆ सौ.वंदना अशोक हुळबत्ते

☆ मनमंजुषेतून ☆ उडणारी म्हातारी ☆ सौ.वंदना अशोक हुळबत्ते☆

बाबांची बाहेर जाण्यांची तयारी सुरू झाली. तसा सार्थक त्यांच्या मागे लागला ‘मी पण येणार…..मी पण येणार’ त्याचा हट्ट बघून बाबा म्हणाले ‘मला आता वेळ नाही. मी संध्याकाळी तुला बाहेर घेऊन जातो’. आता आपली इथं डाळ शिजत नाही म्हटल्यावर सार्थकने रडायला सुरुवात केली. शेवटी वैतागून बाबा म्हणाले ‘चल गाडीवरून एक फेरी मारून आणतो.’ हाताते डोळे पुसतच म्हणाला ‘मोठी….फेरी पाहिजे.’

‘बरं…चल. ‘म्हणत बाबांनी बुट घातले… ते गेले. सार्थकने अंगात शर्ट अडकवला, चड्डी खाली ओढली, हाताने केस सारखे केले धावत बाहेर आला. धावत येताना दरवाजा जोरात धडकला त्यानं लक्ष दिले नाही. नाही तर एरवी या कारणासाठी तासभर रडला असता. बाबांनी गाडी सुरू केली होती. नेहमी प्रमाणे बाबांच्या पाठीला पाठ लावून गाडीवर उलटा बसला. आता समोरून येणाऱ्या गाड्या, सायकली, माणसे सगळं, सगळं दिसणार होत. धावणारी प्रत्येक गोष्ट त्याला आवडे. गाडीने वेग घेताच यांच्या हाताची गाडी सुरू झाली. तोंडाने पी….प….पी..प..आवाज काढत मजा बघत होता. मधूनच दुस-याना बाय बाय करता होता. त्याची हलचाल झाली की बाबा म्हणत ‘ नीट बैस. हलू नकोस.’तेवढ्या पुरत शाहाणा होई. पुन्हा चळवळ सुरू.

समोरून येणारी हवेत उडणारी पांढरी शुभ्र मोठी म्हातारी त्याला दिसली. तिचा तो मुलायम स्पर्श त्याला खुप आवडे‌. आता त्याचा समोर ती होती. वाऱ्यावर झोके घेत ती जवळ येत होती. ती जशी जवळ येऊ लागली तशी आपण तिला कसे पकडावे यांचा तो अंदाज घेवू लागला. एकदा उजव्या बाजूला झाला, एकदा डाव्या बाजूला झाला. हलला तो.

‘नीट बैस. नाही तर.. उतर खाली जा चालत घरी.’

‘साॅरी बाबा. नीट बसतो’ एवढ्यात ती म्हातारी गुंगारा देऊन कुठे तरी पसार झाली होती. आज हातात आली असती जरा हात पुढे करायला पाहिजे होता. तो चुडपुटला. त्या दिवसा सारखी आज ही… म्हातारी हातातून निसटून गेली. क्षणात तो प्रसंग आठवला.

मधल्या सुट्टीत आम्ही खेळत होतो. खेळ रंगात आला होता. एक पांढरी शुभ्र म्हातारी उडत आली आणि  विन्याच्या खांद्यावर टेकली. माझे लक्ष गेले मी तिला पकडणार तेवढ्यात उडाली आम्ही सगळेजण खेळ सोडून तिच्या मागे धावलो, ती हसत हसत वरवर जात होती. जणू आम्हाला चिडवत होती… असेल हिंमत तर पकडा मला. प्रत्येकजण पकडण्यासाठी धडपडत होता. मला काही क्लिक झाले. मी धावत वरच्या मजल्यावर गेलो. ती म्हातारी खालून वर येत होती. आता कुठे जाईल? समोर होती ती जरा हात पुढे करून पकडण्याचा प्रयत्न केला.पण हातात येईना. तेव्हा कठड्यावर चढलो, पाय उंच केले, दोन्ही हात उंचावले,म्हातारीचा हलका स्पर्श झाला. मी पुढे झुकलो….. आता मी पकडणार एवढ्यातच मधली सुट्टी संपल्याची घंटा झाली. मी दचकलो. मी पडणार. मुलांनी आरडाओरड केली. मी घाबरलो मी पडणार…. एवढ्यात एका भक्कम हातानी मला धरले, मागे ओढले. माझे पाय लटपटत होते. पुढे पाटील सर उभे होते. भितीने माझी गाळण उडाली होती. आता सर ओरडणार, मारणार म्हणून मी अंगचोरून उभा होतो. छडी घेण्यासाठी हात पुढे केला. पण सरांनी मला जवळ घेतले ‘बाळा पुन्हा असे धाडस करू नकोस. पळ वर्गात. ‘मी सरांनकडे बघत राहिलो.त्यानी‌ डोळ्यांनी खुण केली जा म्हणून. मी तिथून पळालो. माझ नशिब मी वाचलो. पण ती पांढरी शुभ्र म्हातारी पळाली होती.

गाडीच्या ब्रेक बरोबर मी भानावर आलो. गाडी थांबली. घरात गेलो. पण मनातून ती उडणारी पांढरी शुभ्र म्हातारी जात नव्हती.

© सौ.वंदना अशोक हुळबत्ते

मो.९६५७४९०८९२

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – ☆ मनमंजुषेतून ☆ गणितातील किमयागार रामानुजन – भाग 5 ☆ सौ.अंजली दिलिप गोखले

सौ.अंजली दिलिप गोखले

☆ मनमंजुषेतून ☆  गणितातील किमयागार रामानुजन – भाग 5 ☆ सौ.अंजली दिलिप गोखले ☆

आयुष्य किती जगला ‘ यापेक्षा कसं जगला हे वाक्य तंतोतत सिद्ध करणारे होते रामानुजन यांचे आयुष्य ! अवघ्या 33 व्या कर्तृत्वाच्या वर्षी जग सोडून जावे लागणे आणि तेही एका कर्तृत्ववान तरुणाला यासारखे दुर्दैव नाही.

आपल्या Discovery of India या पुस्तकात रामानुजन यांच्याविषयी पं. नेहरु लिहितात,” अलौकिक रामानुजन चे छोटेसे आयुष्य आणि तरुणपणी आलेला दुर्दैवी मृत्यू आपल्या देशातील गंभीर परिस्थितीची ओळख करून देतो. कुपोषणामुळे अक्षरशहा लाखो मुलं बळी पडली. हे आपल्या देशाचे दुर्दैवच आहे. ”

स्वतः स्वतःचा गुरु बनलेले रामानुजन हे परंपरागत शिक्षण पद्धतीत बसत नव्हते. त्यामुळे प्रो.हार्डी यांना रामानुजन यांना काही शिकवावे लागले. पण त्या शिकवण्याच्या बाबतीत ते म्हणतात,”मी थोडाफार त्याला शिकू शकलो,पण मीच त्याच्याकडून पुष्कळ गोष्टी शिकलो.गणित विषय त्याचा जीव की प्राण होता.धर्मावर त्यांची अढळ श्रद्धा होती तरी सर्व धर्म सारखेच असे तो मानत असे.तो पूर्ण शाकाहारी होता.मात्र त्याच्या हट्टापायी त्याचे खूप नुकसान झाले.रोज स्वतः गार पाण्याने अंघोळ करून स्वतःचे अन्न शिजवणे त्यांनी सोडले नाही.कमालीची थंडी आणि हे कट्टर वागणे त्याच्या शरीराला मानवले नाही.आणि गणिताचे विश्व एका फार मोठ्या बुद्धीमान हिऱ्याला मुकले.”

रामानुजन यांच्या गणितातील तत्त्वज्ञानाचा व्यवहारात वापर होण्याकरता काही काळ गेला. त्यांच्या तत्वज्ञानाचा उपयोग पुढे फार मोठ्या भट्टीतील उष्णतामान मोजण्याकरिता, स्फोटकांच्या भट्ट्या बांधण्याकरता करण्यात आला. भारतातील प्रसिद्ध अनुषक्ती आयोग, Atomic Energy commission आणि टाटा मूलगामी संशोधन संस्था,  Tata institute of fundamental research यांच्या आजच्या प्रगती करीता रामानुजन यांचे ऋण मानतात.

रामानुजन यांनी लहान वयामध्ये गणितातील गवत संशोधन करून देशाचे नाव उज्ज्वल केले पण मृत्यूला सामोरे जावे लागल्यामुळे वडलांना दुःखाच्या सागरात द्यावे लागले. रामानुजन यांची पत्नी जानकी हिला तर आपल्या नवऱ्याची पुरती ओळखही झाली नव्हती. त्यावेळच्या प्रथेप्रमाणे दहाव्या वर्षीच लग्न होऊन ती सासरी आली होती. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सासूला मदत करीत राहणं इतकच तिला माहित होतं. परदेशी गेले ला नवरा आला पण आला तोच मुळी अंथरूणाला खिळून राहिला. त्यामुळे संसार सुख तिला बिचारीला काहीच मिळाले नाही. मात्र रामानुजन यांच्या मृत्यूनंतर तामिळनाडू सरकारने तिला एक बंगला घेऊन दिला. त्या धीराच्या स्त्रीने काही वर्षांनी एका मुलाला दत्तक घेतले आणि त्याला खूप शिकविले. खरोखर भारतीय संस्कारांमध्येमोठी होऊन चे संस्कार जपलेल्या जानकी ला सुद्धा आपण मानले पाहिजे.

गणित हाच ज्यांचा जीव की प्राण होता,गणित हा ज्यांचा श्वास होता,ध्यास होता त्या रामानुजन यांचे आपण स्मरण केले पाहिजे. त्यांचा आदर्श घेतला पाहिजे. त्यांच्या लांबीने छोट्या, पण कर्तुत्वाची  खोल खोली असलेल्या जीवन पटाचे ओळख असल्या तरुण पिढीला करून दिली पाहिजे. नुसते पैशाच्या मागे न लागता त्यांच्यासारखे ध्येयवादी बनले पाहिजे. आपल्या देशातील खरे आदर्श रामानुजन आहेत. त्यांच्या पावलावर पाऊल टाकून भारताचे नाव पुन्हा एकदा जगामध्ये दुममायला पाहिजे. तरच सानेगुरुजींचे    “बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो” हे स्वप्न नक्कीच साकार होईल.

अशा या गणित तज्ञाला,भारताच्या बुद्धिवान सुपुत्राला शतशः प्रणाम.

© सौ. अंजली गोखले

मो ८४८२९३९०११

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares
image_print