मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ तीन पिढ्या…!!! – भाग-3 ☆ डॉ अभिजीत सोनवणे

डॉ अभिजीत सोनवणे

@doctorforbeggars

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ तीन पिढ्या…!!! – भाग-3 ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

(कुणीतरी परीक्षा घेत होतं माझी….! ) इथून पुढे —

तिघांचीही सोय करणं गरजेचं होतं… पण माझ्या स्वतःकडे कोणतीही सोय नाही…. 

तिघांची एकदम, एकाचवेळी, सोय कुठे आणि कशी करणार ? कोण या तिघांना पटकन प्रवेश देऊन कायमची जबाबदारी स्वीकारेल ? 

मी कात्रीत सापडलो होतो, आणि हे तिघेही माझ्याकडे डोळे लावून बसले होते….! 

मागच्या आठवड्यात माया केअर सेंटरचे संचालक डॉ. श्री व सौ भाटेताई यांच्याशी एका कार्यक्रमात भेट झाली होती. 

या दाम्पत्याचं मला कौतुक वाटतं. जिथं प्रत्यक्ष मुलं आपल्या आई बापाला सांभाळत नाहीत, तिथं हे दोघे रस्त्यावर पडलेल्या अनेक लोकांना आपल्या घरात घेऊन येतात. मुलांनी सोडून दिलेल्या आईबापांना स्वतःचे आई-बाबा म्हणून सांभाळतात. 

एखादी व्यक्ती घरात घेऊन येणं म्हणजे एखादी वस्तू घरात आणण्या इतकं सोपं नसतं. त्या व्यक्तीचं जेवण-खाणं, कपडा लत्ता, दुखणं खुपणं, सर्वच बघावं लागतं …. मरेपर्यंत! 

अशात, यांच्याकडे जागा कमी, काम करायला कामगार मंडळी कुणीही नाहीत, अपुरी साधनसामुग्री, सरकारी कोणतीही मदत नाही.

डॉ सौ भाटेताई, स्वतः आजारी असून सुद्धा, स्वयंपाक बनवण्यापासून ते भांडी घासण्यापर्यंत सर्व कामं करून या आईबाबांची सेवा शुश्रूषा करतात.

अशाही परिस्थितीत, यापूर्वी रस्त्यावर मला सापडलेले चार ते पाच लोक मी यांच्या सेंटरला ठेवले आहेत, डॉ भाटे दांपत्य, माझ्या या लोकांचा सांभाळ करत आहे. 

ऋण कसं फेडावं यांचं ? 

इतक्या प्रतिकूल परिस्थितीत असताना, आपण आणखी तीन लोकांचा भार यांच्यावर टाकावा का ? …. असं म्हणत, निर्लज्जपणे मी पुन्हा डॉ. भाटे सरांनाच फोन लावला. 

भाटे सरांना विषय सांगताच ते चटकन म्हणाले, ‘पाठवून द्या सर माझ्याकडे त्यांना.’

‘पण भाटे सर, अगोदरच तुम्ही इतक्या प्रतिकूल परिस्थितीतून वेळ मारून नेत आहात त्यात…’ 

मला पुढे बोलू न देता ते म्हणाले, ‘परिस्थिती आपल्याला अनुकूल अशी कधीच नसते, ती आपल्याला बनवावी लागते सर, आणि आपण परिस्थिती अनुकूल होण्याची वाट बघत बसलो तर रस्त्यात पडलेले हे लोक आपली वाट न बघता देवाघरी जातील, आपणच मग आपल्याला माफ करू शकणार नाही… पाठवून द्या तुम्ही तिघांनाही…!’ 

काय बोलू मी या माणसापुढे ?

शुक्रवार 17 डिसेंबर 2021,  हा दिवस या तिघांना भाटे यांच्या आश्रमात पाठवण्यासाठी मी निश्चित केला.

त्या अगोदर बाकीची सर्व तयारी म्हणजे पोलिसांना कळवणे, त्यांच्यासाठी लागतील त्या सर्व वस्तू विकत घेणे वगैरे सोपस्कार पार पाडले. 

शुक्रवारच्या सकाळी यांची आंघोळ आणि दाढी कटिंग झाली.

यांना आणलेले नवे कोरे कपडे घातले. तिघांनाही नवीन बॅगा आणि सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत ज्या वस्तू लागतात त्या सर्व वस्तू त्या बॅगेत ठेवून दिल्या. 

आंघोळ आणि दाढी-कटिंग नंतर, वर्षानुवर्षे काळवंडून पडलेली पितळी समई, घासावी पुसावी आणि लख्ख व्हावी …. तसे आता हे तीघे दिसत होते… !

पहाटेचा काळोख हळूहळू विरत जावा आणि सूर्याने आपला मुखडा दाखवावा…. आज तसे ते दिसत होते… !!! 

संध्याकाळी घरात पूर्ण अंधार असावा आणि देव्हाऱ्यामध्ये ठेवलेली पणती आपण चेतवावी आणि यानंतर तो देव्हारा काळोखात उजळून निघावा, आज तसे भासत होते मला हे तिघेही…. !!! 

माझ्यासाठी हिच पूजा…हाच माझा अभिषेक… ! 

हाच माझा नैवेद्य… हाच मला मिळालेला प्रसाद आणि हिच मी केलेली आरती… !!!

आता दुसरी कुठलीही पूजा मांडण्याचं मला कारण नाही….. माझी पूजा झाली ! 

क्रमशः….

© डॉ. अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ तीन पिढ्या…!!! – भाग-2 ☆ डॉ अभिजीत सोनवणे

डॉ अभिजीत सोनवणे

@doctorforbeggars

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ तीन पिढ्या…!!! – भाग-2 ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

(माझ्या आजोबांसारखा….. आजोबांसारखा कसला…. आजोबाच की….!) इथून पुढे —- 

पॅरालिसिस होऊन गेल्यानंतर त्या रुग्णांमध्ये काहीही केलं तरी विशेष सुधारणा होत नसते, तरीही माझ्या या आजोबांना हॉस्पिटलमध्ये एडमिट केलं.

हेतू पुन्हा तोच…. किमान काही दिवस हॉस्पिटलमध्ये का होईना, पण  चांगल्या ठिकाणी  तरी राहतील आणि दोन वेळच्या जेवणाची तरी सोय होईल. 

एके दिवशी या ही हॉस्पिटल मधून सुद्धा फोन आला, तुमच्या पेशंटचं जितकं काही करता येणं शक्य आहे ते आम्ही केलं आहे, पेशंटला डिस्चार्ज देत आहोत, कृपया त्यांना घेऊन जावे. 

आता या आजोबांना कुठे घेऊन जाऊ ?  की सोडू परत बागेबाहेरच्या त्याच फूटपाथवर यांना ? की सांगू त्यांना ?  पडून राहा इथे बागेबाहेर …. मरणाची वाट बघत ! 

प्रसंग तिसरा – पुणे कॉर्पोरेशनकडून शनिवारवाड्याकडे जात असताना,  तिथल्या पुलावर अचानक एक फोन आला, मी गाडी थांबवून तो फोन घेतला.

माझं सहज लक्ष गेलं, पुलाच्या कठड्यावर एक मध्यम वयाची व्यक्ती बसली होती. त्याला दिसत नव्हतं, हे त्याच्या हालचालींवरुन मला समजलं, जागेवरच बसून त्याची काहीतरी चुळबूळ चालली होती.

थोडा चुकला, तर पुलाच्या कठड्यावरून सरळ खाली पाण्यात पडेल…. त्याला कुठेतरी सुरक्षित जागेत बसवून द्यावं, असा विचार करून त्याच्या जवळ गेलो, त्याला सुरक्षित जागेत हलवलं आणि सहज विचारपूस केली… 

याचं सध्याचं वय साधारण 42

सर्वसामान्य लोकांप्रमाणेच याला दिसत होतं, पण घरच्या कटकटीमुळे वैतागून पुण्यात आला, एका हॉटेलमध्ये नोकरी करून स्वतःपुरता व्यवस्थित जगत होता.

एके दिवशी, म्हणजे त्याच्या वयाच्या चाळीसाव्या वर्षी एका अपघातात डोक्याला मार लागला आणि यात त्याची दृष्टी गेली. 

दृष्टी गेली, तशी नोकरी गेली….  घर आधीच सुटलं होतं…. आता तो भिक्षेकरी म्हणूनच जगायला लागला. फूटपाथ वर राहायला लागला 

जन्मतः ज्यांना दृष्टी नसते ते लहानपणापासून परिस्थितीशी जुळवून घ्यायला शिकतात….

पण वयाच्या चाळीसाव्या वर्षी, दृष्टी जाणे हा धक्का अतीभयानक असतो. ते परिस्थितीशी जुळवून घेऊ शकत नाहीत….! 

अचानक पणे बसलेल्या अशा धक्क्यातून कुणीच लवकर सावरू शकत नाहीत. अशात घरच्यांचा आधार असेल तर ठिक , पण ज्याला कोणाचाच आधार नाही, अशा दृष्टी गेलेल्या व्यक्तीने जगायचं कसं ?

याची कहाणी ऐकून, मी याच्या जवळ ओढला गेलो…. 

यानंतर आधुनिक वैद्यक शास्त्रात डोळ्यांच्या संदर्भात ज्या काही ट्रीटमेंट असतील त्या सर्व ट्रीटमेंट त्याला पुण्यातल्या नामांकित Opthalmologist कडून दिल्या. पण कसलाही फरक पडला नाही….

शेवटी माझा मित्र डॉ. समीर रासकर याने सांगितलं, निसर्गापुढे आपण हरलो आहोत, याला आयुष्यात कधीही दिसणार नाही. 

याला हे समजल्यानंतर, ज्या पद्धतीने तो कळवळून रडला होता, ते कारुण्य मला इथे शब्दात मांडता येणं शक्य नाही. 

तरीही त्याच्या मनाला उभारी देऊन, त्याला एक व्यवसाय टाकून दिला.

फुटपाथवर बसून तो हा व्यवसाय करायचा. 

रात्री कुठेतरी आडोशाला झोपायचा.  भुरटे चोर येऊन याला त्रास द्यायचे,  झालेली कमाई काढून घेऊन पळून जायचे….  दिसत नसलेला हा….  याने प्रतिकार कसा करावा? 

आता, वैतागून तो आत्महत्येची भाषा करायला लागला. 

कुणाच्यातरी देखरेखीखाली त्याला ठेवावं असं मला वाटू लागलं…. अन्यथा डिप्रेशन मध्ये त्याने स्वतःचा अंत करून घेतला असता…!

नेमकं काय करावं मी ? या एका मागोमाग आलेल्या तीन प्रसंगांनंतर…..? 

पहिल्या बाबांची सोय कुठे करावी….?  या विचारात असताना दुसरे बाबा समोर आले…..आता या दोघांची सोय कुठे करावी ?  या विचारात असताना हा तिसरा अचानकपणे समोर आला…

कुणीतरी परीक्षा घेत होतं माझी….! 

क्रमशः….

© डॉ. अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ तीन पिढ्या…!!! – भाग-1 ☆ डॉ अभिजीत सोनवणे

डॉ अभिजीत सोनवणे

@doctorforbeggars

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ तीन पिढ्या…!!! – भाग-1 ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

प्रसंग पहिला – साधारण सहा महिन्यांपूर्वीचा…

नेहमीप्रमाणे याचकांच्या भेटीला निघालो असताना, पुण्याच्या मध्यवर्ती गजबजलेल्या भागात एका सरकारी ऑफिसच्या गेट बाहेर, दाढी वाढलेल्या आणि अत्यंत गलिच्छ अवतारात, उकिरड्यात झोपलेल्या बाबांना विव्हळताना पाहिलं.

जवळ जाऊन पाहिलं तर पायाला भली मोठी जखम झाली होती आणि त्यात अक्षरशः किडे वळवळत होते.

बाबांची ओळख झाली, त्यांची व्यथा समजून घेतली. 

यानंतर किडे बाहेर काढण्याची वेगवेगळी औषधे वापरून रस्त्यावर ड्रेसिंग करत राहिलो. जखम बरी झाली झाली… म्हणता म्हणता पुन्हा बिघडायची.

मला जाणवलं की, हे किडे रस्त्यात अशी मला दाद देणार नाहीत…. रस्त्यावरचे किडेच ते….!

आपल्या आजूबाजूलाही असतात असे अनेक किडे…. दुसऱ्यांची आयुष्य पोखरणारी….!

तर यांना माझे मित्र डॉ. शोएब शेख यांच्या मॉडर्न हॉस्पिटल पुणे येथे ऍडमिट केलं.  इथल्या टीमने प्रयत्नांची पराकाष्ठा करुन बाबांचा पाय वाचवला. 

दवाखान्यात होते, तोवर अन्नपूर्णा प्रकल्पातून जेवणाची सोय लावून दिली.

मला आपलं एकच सुख… बाबा जोपर्यंत ॲडमिट आहेत तोपर्यंत हॉस्पिटलमुळे निवारा तरी आहे…. दोन वेळच्या जेवणाची सोय तरी होतेय. किमान रस्त्यावर तरी आता यांना पडून राहावं लागत नाही. 

एके दिवशी हॉस्पिटल मधून फोन आला, येत्या काही दिवसात बाबांना डिस्चार्ज करत आहोत, त्यांची ट्रीटमेंट पूर्ण झाली आहे, त्यांना घेऊन जावे. 

डिस्चार्ज झाल्यानंतर मी त्यांना कुठे घेऊन जाणार होतो ?  परत त्याच रस्त्यावर ?  त्याच जागेवर ?? त्याच उकिरड्यात सोडून येऊ?? त्यांच्या मुलानेही हेच केलं होतं…. मी पण तेच करू ??? 

प्रसंग दुसरा – पुण्यामध्ये एक प्रसिद्ध बाग आहे. अनेक दानशूर मंडळी येथे अन्नदानाचे काम करत असतात.

इथे भीक मागणारी मंडळी मला एक गठ्ठा भेटतात,  मी इथेही वार लावून येत असतो. 

एके दिवशी बागेशेजारच्या फुटपाथवर एक आजोबा पडलेले दिसले. जवळ गेल्यानंतर कळलं यांना Paralyais झाला आहे , वाचा जवळपास गेली आहे. 

आता यांच्याशी बोलायचं कसं ?  यांचा भूतकाळ कसा जाणून घ्यायचा ? 

ज्यांना बोलता येत नाही,  ते किमान हातवारे करून, खाणाखुणा करून काहीतरी सांगतात, त्यातून काहीतरी दिशा मिळते.

परंतु पॅरालिसीस झालेल्या या बाबांकडे हे दोन्ही मार्ग नव्हते….  ना ते खाणाखुणा करु शकत,  ना स्वतःची वेदना शब्दात मांडू शकत….!

पण वेदनेला शब्दांची गरज नसते…. संवेदनेला भाषा नसते….! 

निष्प्राण डोळ्याने माझ्याकडे बघत मला बोबड्या बोलीत काहीतरी ते सांगण्याचा प्रयत्न करायचे….. परंतु मला काहीही कळायचं नाही.

ते जमिनीवर पडून असायचे…. मी यांच्याकडे गेलो कि काही न बोलता यांच्या डोळ्यातून टपटप आसवं गळायची…. आपल्याला पाहून कुणाची तरी आसवे टपकली तर समजावे, आपल्या बरोबर तो त्याचा गतकाळ वाटू इच्छितोय….! 

मी जवळ बसलो कि माझा हात धरायचा ते प्रयत्न करायचे….. बुडता माणूस जसा मिळेल तो आधार शोधतो तसा….

मला कळलं, हे माझ्यात आधार शोधत आहेत….!

एकदा त्यांनी हाताची पाच बोटं तोंडाकडे नेत मला इशारा केला…. मला कळलं, यांना भूक लागली आहे, मी बाजूच्या हॉटेलमधून काहीतरी मागवलं…. आणि त्यांच्या तोंडापुढे  नेलं…. पण त्यांनी तोंड फिरवलं….

मला काहीच कळेना….

यानंतर त्यांनी मनगटावर बोट ठेवलं…. आणि पुन्हा हाताची पाच बोटं तोंडाकडे नेत, माझ्याकडे बोट दाखवलं ….

ओह…. त्यांना म्हणायचं होतं…. खूप वेळ झालाय पोरा, तू जेवून घे…..!

मी त्यांच्या या बीन बोललेल्या वाक्यावर रडलो होतो तेव्हा …!!!

जो स्वतः उपाशी आहे, तो दुसऱ्याला म्हणतो…. जेवून घे….! खूप मोठं मन लागतं याला…..

असं हे बीन शब्दाचं, बीन भाषेचं आमचं नातं….! 

माझ्या आजोबांसारखा….. आजोबांसारखा कसला…. आजोबाच की….! 

क्रमशः….

© डॉ. अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ हिंदी आणि मी— भाग तिसरा ☆ सुश्री सुनिता गद्रे

सुश्री सुनिता गद्रे

 

? मनमंजुषेतून ?

 ☆ हिंदी आणि मी— भाग तिसरा ☆ सुश्री सुनिता गद्रे ☆ 

(हिंदीभाषिकांकडून  ” आपकी हिंदी बहूत अच्छी है “असे अभिप्राय जेव्हा मला मिळू लागले तेव्हा मला एक मोठी लढाई जिंकल्याचा आनंद झाला.) इथून पुढे —–

सुरुवाती सुरुवातीला उत्तर भारतीयांच्या शब्दप्रयोगाचं मला खूप हसू यायचं. त्यातले मुख्य म्हणजे स् वर्ण प्रथम असलेली जोडाक्षरे. एकदा श्रीराम सेंटरला एक हिंदी नाटक पाहायला आम्ही गेलो होतो. हिंदीतले खूप नामवंत कलाकार त्यात होते. एक असाच गंभीर प्रसंग त्यात चालला होता…. आणि नायक नायिकेला एका मोठ्या संवादात,” मैं पुरुष हूँ और तुम एक इस्त्री हो”…असे जेव्हा म्हणाला,तेव्हा एकदम मला जोरात आलेल्या हसण्याच्या आवाजानं आजूबाजूचे, मागचे पुढचे लोक माझ्याकडं रागानं बघू लागले होते.

खूप जण हल्ली जाणीवपूर्वक स्कूल, स्टेशन असं म्हणायला लागलेत. पण बरेच जण अजून इस्कूल, इस्टेशन  असेही म्हणणारे आढळतात. कोणी कोणी अनावधानाने बोलून पण जातात—

” सुनिता वो राईस इस्पून (भातवाढी)जरा इधर देना.” माझी एक उच्चशिक्षित मैत्रिण मला म्हणाली होती—-“ माझा एका विद्यार्थी इस्कूल म्हणायचा. माझे खूप प्रयत्न करून झाले पण काही उपयोग झाला नाही. मग एकदा मी त्याच्या आईला ते सांगितले. तर ती म्हणाली ” मुझे कहाँ बोलना आता है जो उसको आएगा. फिर भी मैंने उसको बताया है कि बेटा,सकूल या अस्कूल बोला करो।” कपाळावर हात मारून घ्यायची वेळ माझ्यावर आली होती.

मोठे मोठे सुशिक्षित नेते सुद्धा भाषण करताना…’ देश में महिलाओं का जीवन अस्तर हमें उपर उठाना है…’ अशा तर्‍हेची वाक्ये बोलून जातात। हे जरा तरी ठीक आहे. पण ‘ देश को हम अस्थायी किंवा अस्थिर सरकार देंगे, किंवा यह मेरा अस्पष्ट मत है।’ असं म्हणत असतात तेव्हा त्याचा एकदम विरुध्द अर्थ होतो, याची त्यांना जाणीवही नसते.

‘स ‘च्या ठिकाणी ‘श’ आणि ‘श’च्या ‘स’ हे तर पहाडी, बिहारी,पूर्व यु.पी.तल्या लोकांत नॉर्मलच असतं. तो थोडा अर्धमागधीचा प्रभाव पण म्हणता येईल. पण बिहारी लोक ‘ हम हूँ ना ‘ ..’मैं नरभसा गई’ (मी नर्व्हस झाले ),हमारा भिलेज (व्हिलेज ),अशा तऱ्हेने बोलतात, नंतर मला त्याही शब्दांचे अर्थ चांगले कळू लागले. तोंडात रोशेर गोला भरून बोलणारी माझी बंगाली मैत्रीण ‘’आज शोपिंग के लिए कोमला नगर मत जाना.आज वहाँ बोंद है.”  किंवा अशा तऱ्हेचं काही बोलली तर त्यावर हसणं मी बंद केलं.

आठ कोसावर भाषा बदलते म्हणतात. ते तर खरे आहेच. पण थोड्याथोड्या कालांतरानेही भाषा बदलते. पूर्वी अंकल, आंटी, सर, मॅडम यापुढे ‘जी’ लावायची जी पद्धत होती, ती आता बंद झालीय. एकदा माझी आई दिल्लीला माझ्याकडे आली होती. मी एका वयस्कर ऑंटीबरोबर फोनवर बोलत होते…आणि माझं हाँजी,हाँजी चालू होतं.( जिथे साधारणपणे मराठी हो,हो- हो, बर,बरंय असं बोललं जातं.) ” तू इतरांची किती हांजी- हांजी करतेस गं “हे माझ्या आईचे बोलणे ऐकून मला खूप हसू कोसळेले होते. 

एकेकाळी बहू शब्दाचा अर्थ आजच्यासारखा सून असा होत नव्हता. तर तो होता ‘ब्याहता.’ वह शर्मा,वर्मा, गुप्ता कोई भी… उनके खानदान की,घरकी ब्याहता…मतलब बहू. और नरेश की बहू, रामलाल की बहू, मतलब सून नाही तर…उसकी पत्नी. पण काळाच्या ओघात ती आता सूनच ! काळाबरोबर भाषा बदलते याचे हे एक उदाहरण.

आता तर दिल्लीची भाषा हिंदी ऐवजी  हिंग्लिश झालीय.

दरवर्षी हिंदी दिवस साजरा करताना ‘हिंदी को बढावा दो’ असे सगळ्या साहित्यिकांना, विचारवंतांना कळकळीने सांगावे लागतेय. 

पण हेही खरे आहे की, बोली भाषा बदलत गेली की त्यानुसार साहित्यिक भाषाही हळूहळू बदलत जाणारच.ती जिवंत भाषेची खूण आहे. बदलणे हा निसर्गाचा आणि सजीवांचाही नियमच आहे. त्यामुळे आपल्यासारख्या सामान्य लोकांनी विचारपूर्वक बदल स्वीकारणे हेच प्रासंगिक आहे.

* समाप्त *

© सुश्री सुनीता गद्रे

माधवनगर सांगली, मो 960 47 25 805.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ हिंदी आणि मी— भाग पहिला ☆ सुश्री सुनिता गद्रे

सुश्री सुनिता गद्रे

 

? मनमंजुषेतून ?

 ☆ हिंदी आणि मी— भाग पहिला ☆ सुश्री सुनिता गद्रे ☆ 

पन्नास वर्षांपूर्वीची गोष्ट! माझे लग्न ठरले आणि माझ्या आजीला नातीला लग्नानंतर दिल्लीला…इतके दूर पाठवावे लागणार या विचाराने रडूच कोसळले.

” जावयांना इकडे बदली करून घ्यायला सांग. तिकडची भाषा वेगळी.लोक वेगळे. त्यांचे रीतीरिवाज… सगळेच वेगळे. वेळ प्रसंगी मदतीची गरज वाटली तर ही बिचारी काय करणार?” तिने बाबांच्या मागे टुमणेच लावले .(तेव्हा आता सारखे घरोघरी फोन, हाता- हातात मोबाईल नव्हते.)

“अगं जावयांचा जॉब ट्रान्सफरेबल नाही.” बाबा आपल्या आईला समजावत होते,” आणि हल्ली या चिमण्या तर नवरोबाबरोबर सातासमुद्रापार पण मजेनं उडून जातात… तिथं दिल्लीची काय कथा? ना पासपोर्ट ना व्हिसा…ठरवलं की एक -दोन दिवसात येथे हजर!..”

माझ्यासाठी म्हणायचं झालं, तर जिने महाराष्ट्राची राजधानी, मुंबई पण पाहिली नव्हती तिला देशाच्या राजधानीत वास्तव्य करायला मिळणार होतं. इतर सगळ्या गोष्टींबरोबर हा एक प्लस पॉइंट पण होता…. अन् भाषेचं काय विशेष? मला एस. एस .सी. ला हिंदीत 75% मार्क मिळाले होते. (तेही त्या वेळच्या कडक मार्किंग सिस्टीममधे!) …मी टिळक विद्यापीठाच्या हिंदीच्या तीन परिक्षातही प्रथम श्रेणी मिळवली होती. आणि हां, हिंदी पिक्चर बघतोच की आपण. छान कळतात ते …मी भाषेच्या बाबतीत थोडी ओव्हर- कॉन्फिडन्टच होते. (तेव्हा महाराष्ट्रात टेलिव्हिजन पोहोचला नव्हता आणि शेंबड्या पोरालासुद्धा हल्ली जसे हिंदीत बोलता येते, तितपत  हिंदीही  कोणाला बोलता येत नसायचे.)

यथावकाश आम्ही दिल्लीला पोहोचलो. ( तिलक ब्रिज की मिंटो ब्रिज ?)  नक्की आठवत नाही, पण ट्रेन तिथे थांबली होती आणि गाडीतून घडलेल्या दिल्लीच्या पहिल्या दर्शनातच मी तिच्या प्रेमात पडले होते.

दुसऱ्या दिवशी घरमालकिणीचा छोटा मुलगा आमच्याकडे आला.  “ऑंटीजी कल आप दोनों के लिये हमारे घर में दावत है .” वह बडा खुश होकर बोल रहा था. “वह सब कुछ मम्मीजी आपको बतायेगीही. लेकिन अभी आप को मम्मीजी ने बुलाया है .थोडी देर के लिये ! अंकल आज घर पर नहीं है नं…”  मी ,उद्या आम्ही दोघं मिळून येऊ असे सांगून नकार देणार होते. पण तो इतक्या गोड आवाजात बोलत होता की मला नाही म्हणवलेच नाही. मिठाईचा एक पॅक घेऊन मी त्या छोट्या बरोबर त्यांच्या घरी गेले आणि त्याच्या आईच्या हातात तो देऊन मी वाकून त्यांना एका हाताने चरणस्पर्श केला.( हिंदी पिक्चर स्टाईल मधे!)

बसल्यावर सगळ्यात प्रथम माझं लक्ष त्यांच्या गळ्याकडं गेलं. ओह्, मंगळसूत्र नाही म्हणजे या विधवा असाव्यात. चार-पाच मुलं मुली मला निरखून पाहत होते.( त्यांना सहा मुली आणि दोन मुलगे आहेत, हे ह्यांनी सांगितल्यावर मला आश्चर्यच वाटलं होतं .पण कुटुंबनियोजनाचा दिल्लीत खूप धज्जा उडवला जातो हे मला नंतर कळले. ) त्यांना एवढयांचं पालन-पोषण एकटीनं करणं ही बाब मला खूप अवघड वाटली. पण घरमालकांची ओळख झाल्यावर मला कळलं की विवाहित स्त्रीनं मंगळसूत्र घालायची तिथे पद्धतच नाही.लग्नानंतर पायात जोडवी घालतात .

“बैठो आराम से ” माझ्या हातात पाण्याचा ग्लास देऊन  ऑंटीजी म्हणाल्या …नंतर हिंदीतून प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली. आणि जमतील तशी उत्तर मी देऊ लागले.

” तुम्हारा पिहर कहा है?”… हा शब्द कधीच वाचनात आला नव्हता.” पिहर मिन्स ?” मी विचारती झाले .त्या सर्वांना माझ्या एकंदरीत सगळ्या बोलण्याचं हसू येत होतं आणि मी नर्वस होऊ लागले होते. “मतलब मायका…. मम्मी का घर.”    मी उत्तर देईपर्यंत पुढचा प्रश्न उपस्थित झाला.

” तुम्हारा दहेज का सामान कहाँ है?”

‘म्हणजे हुंडा’- मी मनात म्हणाले. आणि….हुंडाबंदीसाठी मोठी लेक्चरं झाडणार्‍या मला,  फर्राटेदार हिंदीतून आपलं म्हणणं पटवून देता आलं नसतं, याची जाणीव झाली.. म्हणून  मी प्रथम गप्पच राहिले. पण नंतर हसून मी प्रसंग सावरुन घेतला. मी मनसोक्त थापा मारल्या.

अजी वो सोफासेट, फ्रिज, और हेवी सामान नां? वो और बहूत सारा सामान मैं ससुराल छोड आई हूँ. बहुत दूर का मामला हैं ना इसलिये. सिर्फ थोडीसी ज्वेलरी लाई हूँ. चार -चार सेट दिये है मेरे मम्मी- पापाने. उधर अभी टीव्ही पहूँचा नही है, तो उसके पैसे भी दिये है उन्होंने.”– आपल्या विचारांवर नव्हे तर उत्तरावर मी खूष झाले होते.

क्रमशः—-

© सुश्री सुनीता गद्रे

माधवनगर सांगली, मो 960 47 25 805.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ऐसी कळवळ्याची जाती ☆ डॉ. ज्योती गोडबोले

डॉ. ज्योती गोडबोले 

? मनमंजुषेतून ?

☆ ऐसी कळवळ्याची जाती ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆ 

तुकारामांनी म्हटलेली ही कळवळ्याची जाती, काही माणसे उपजतच घेऊन येतात. ते त्यांच्या सहजवृत्तीतूनच होते.

माझा भाचा आदित्य हा त्यातलेच एक उदाहरण. 

किती लहान होता तो. एक दिवस घरी आला आणि म्हणाला,” मला लवकर खायला दे, खूप भूक लागलीय. “

आई म्हणाली, ‘ डबा नाही का खाल्लास? ” तर काहीच बोलेना.

एवढ्यात शेजारचा  कुशल आला. ” म्हणाला काकू ,आज ना,डबा खायच्या सुट्टीत गंमतच झाली. आम्ही डबा खायला सुरवात करणार, इतक्यात बागेला पाणी देत असलेला माळ्याचा मुलगा चक्कर येऊन पडला आदित्य लगेच उठून गेला. तो मुलगा उपाशी होता,सकाळपासून. 

अहो,आदित्यने स्वतःचा डबाच देऊन टाकला त्याला. आम्ही नाही बाबा दिला.’

आदित्य तरी गप्पच होता.आदित्यला काकू रागावत नाहीत,हे बघून कुशल निघून गेला. 

स्वातीने त्याला पोटाशी धरले. ” आदित्य,खूप गुणी मुलगा आहेस रे. पण कसा निभाव लागेल बाबा तुझा या जगात…. ? “

आदित्यचे  छंदही जगावेगळेच होते. एक दिवस कचरा पेटीजवळ कुडकुडत असलेले कुत्र्याचे पिल्लू घेऊन आला. वर आईला म्हणाला,” आई रागावू नकोस ना. माझ्या वाटणीचे दूध आणि पोळी त्याला दे.” 

ते पिल्लू काय मग—घरचेच झाले. रोज आदित्यची रिक्षा आली की पळत पळत रिक्षामागे धावायचे. तो शाळेतून यायची वेळ झाली की असेल तिथून येऊन पायरीवर वाट बघत बसायचे. 

त्यांच्या घरातल्या कामवाल्या बाईला हा भांडी घासायला मदत करायचा. तिच्या मुलाला शिकवायचा. त्याचा अभ्यास घ्यायचा. अजूनही तो मुलगा– गणेश हे विसरला नाही. 

म्हणतो,” आदित्य दादामुळे मी शिकलो. नाहीतर बसलो असतो असाच, वाईट संगतीत. 

आदित्यदादामुळे मी  graduate झालो. किती वेळा गुपचूप माझी फी भरलीय त्यांनी—

माझी  मुलगी पण लहानपणी जगावेगळीच होती. सगळ्या जगाचा तिला कळवळा. तिचा आवाज अतिशय सुंदर म्हणून मी तिला गाण्याच्या क्लासलाही घातले होते शाळेतला गाण्याचा कोणताही कार्येक्रम श्रुतीशिवाय व्हायचाच नाही. एकदा शाळेतून गाण्याच्या बाईंचा निरोप आला, ” येऊन भेटा.”– मी गेले भेटायला. त्या म्हणाल्या,” श्रुती यावेळी भाग घेणार नाही म्हणते. असे का? ती असे कधी करत नाही.” 

घरी आल्यावर मी विचारले तर म्हणाली, “आई, बाईंनी, माझ्या पट्टमैत्रीण गौरीला गाण्यातून काढून टाकले. तिला किती वाईट वाटले असेल अग. मग तिच्याशिवाय मी कशी घेऊ भाग ?”

मी कपाळाला हात लावला–‘ देवा।कसे होणार या मुलीचे पुढे आयुष्यात.’

एकदा तर तिने कळस केला. 

गणितात हिला १00 पैकी १00 मार्क मिळाले. आणि तिची मैत्रीण कमी मार्क मिळाले म्हणून रडत होती. हिने बाईना सांगितले, ” बाई,माझ्यातले 10  मार्क द्या ना अनुजाला, म्हणजे तिचे मार्क वाढतील.” 

या असल्या स्वभावाची तर मला चिंताच वाटू लागली पुढे पुढे.

एकदा म्हणाली, ” तुम्ही दोघेही डॉक्टर आहात ना, मग माझ्या शाळेत शिबिर घ्या की. 

आमच्या शाळेतल्या गरीब शिपाई आणि शिपाईबाईना कोणीच तपासत  नाही. “

 आम्हाला तिचे इतके कौतुक वाटले. आम्ही तिच्या शाळेत खरोखरच फक्त सेवक वर्गासाठी शिबिर घेतले. मुख्याध्यापक बाईनी श्रुतीचे त्यासाठी मुद्दाम आभार मानले. पण ही शांत बसली होती. तिला ना गर्व, ना आपण फार काही केल्याचा अभिमान—-

आणि हे स्वभाव कायम राहतात. तीव्रता कमी जास्त होते,पण जात मात्र नाहीत. अर्थात ही माणसे इतकी सरळ असतात–सुदैवाने त्यांचे काही वाईटही होत नाही म्हणा. 

पण मग पुढे, लबाड जगात, माणसे ओळखायची कला यांना येत नाही. अनपेक्षित फटके बसले, की कळवळतात. पण धडे कुठे घेतात ?नाहीच। मूळ स्वभाव जात नाही.

यथावकाश श्रुतीचे लग्न झाले. अगदी लाखात एक नवरा मिळाला, आणि परदेशात निघूनही गेली एकदा भारतात सुट्टीवर आले होते दोघे. सहज बोलताना जावई म्हणाला, ” तुमची मुलगी वेगळीच आहे हो।” 

म्हटले ‘ बाप रे,आता काय ऐकावे लागतेय.’

म्हणाला, ” हिचा गेल्यागेल्या लगेचच वाढदिवस होता. तर मी विचारले पार्टीला कोणाकोणाला बोलवायचे ग .तर गप्पच बसली. मग म्हणाली,पार्टी बिर्टी नको. मला इथला अनाथ मुलांचा आश्रम दाखव. आपण त्या  मुलांच्यात सबंध दिवस घालवू. त्यांना खाऊ पुस्तके, गिफ्टस देऊ. 

चालेल ना तुला ? “

त्याला इतका अभिमान वाटला तिचा. तो दिवस त्यांनी अक्षरशः एन्जॉय केला त्या मुलांबरोबर. 

आता दरवर्षी ते त्या आश्रमातच आपला वाढदिवस साजरा करतात. 

नंतर  तिला मुलगा झाला. त्याला घेऊनही हे तिकडेच जाऊ लागले, आणि त्याचाही वाढदिवस तिथेच साजरा करू लागले. मुलानेही सही सही आईचा सहृदय स्वभाव उचललाय. तो वेडा तर स्कॉलरशिपचे मिळालेले पैसेही,कोण्या गरीब मुलाची फी भरून खर्च करून टाकतो.

‘ कुठून येते हे?’–मला खूप आश्चर्य वाटते. आता  माझा भाचा आदित्य मोठा झालाय. खूप छान नोकरी आहे त्याला बोटीवर. परवा आला होता तर अंध शाळेत गेला, आणि खूप मोठी रक्कम त्या मुलांना लॅपटॉप घेण्यासाठी देऊन आला.म्हणाला,” मला शक्य आहे म्हणून पैसे दिले

डोळे तर नाही ग देऊ शकत.” 

आमचे डोळे नुसते भरून आले. केवढे हे मोठे मन. 

आपल्या तुकोबा माउलींनी तर ही जात केव्हाच ओळखली होती हो. किती द्रष्टे असतील तुकोबा—-म्हणूनच म्हणून गेलेत —

ऐसी कळवळ्याची जाती

करी लाभावीण प्रीती.

©  डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ बोलता बोलता भाग 6 ☆ श्री सुधीर गाडगीळ

श्री सुधीर गाडगीळ

? मनमंजुषेतून ?

☆ बोलता बोलता भाग 6 ☆ श्री सुधीर गाडगीळ ☆

बर्मिगहॅमला मुलाखतींच्या राज्यात शिरण्यापूर्वी चंदू बोर्डे, नाना पाटेकर यांच्यासह क्रिकेटदेखील खेळलोय. त्या वेळी बॅटिंग करत होते श्रेष्ठ शास्त्रज्ञ जयंत नारळीकर. वयाचं- कर्तृत्वाचं अंतर असूनही सी. रामचंद्र गळ्यात हात टाकून, गाण्यांच्या जुन्या आठवणी जागवताना मजजवळ फोटो आहे. कन्नडभाषी सुधा मूर्ती स्वच्छ मराठीत कोल्हापुरात माझ्या गप्पाष्टकात सहभागी झाल्यात आणि पुण्यातल्या दर्शन हॉटेलमध्ये नारायण मूर्तीशी झालेल्या नमनाच्या भेटी त्यांनी खुलवून सांगितल्यात. विजय तेंडुलकरांशी गुन्हेगारी जगतावर बोलण्यात रमलोय.

आता माझ्या मुलाच्या वयाचे सारे स्टार्स आहेत. विश्वजीत कदम, पंकजा मुंडे, प्रणिती शिंदे, अमित देशमुख असे राजकारणात आहेत. तर राहुल- महेश काळे, शौनकसारखे गायक गाजतायत. या नव्या पिढीसमवेतही माझे सूर जुळलेत. नुकतंच दुबईला महेश-राहुलशी गप्पा मारत, सुबोध भावेला आठवत आम्ही ‘पाडवा’ साजरा केला.

जाता जाता एक सांगतो मला अजिबात न आवडणाऱ्या माणसांची मुलाखत घ्यायची वेळ आली तरी मी टाळत नाही. कारण त्या निमित्ताने माझं ‘न’ आवडणं, हे गैरसमजावर आधारित आहे का, हे तपासता येतं आणि माझी चूक असेल तर माझीच मनातली ‘मतं’ पुसून टाकून, मैत्र वाढवता येतं. जॉर्ज फर्नाडिस ते बाबामहाराज सातारकर, सिंधुताई सपकाळ ते निर्मलाताई पुरंदरे, पु. भा. भावे ते अनिल अवचट अशा परस्पर टोकाच्या मतप्रणालींशी झालेला संवाद सांगणं म्हणजे स्वतंत्र ग्रंथच होईल. फक्त इथे नोंद घेतो. न नोंदता आलेले हजारभर !

एकच सांगतो, या साऱ्या माणसांशी बोलताना जमा झालेले ‘संदर्भ’ मुलाखतींच्या राज्यात उपयोगी पडलेत आणि संदर्भाची सतर्कता, बोलण्यातली अनौपचारिकता, मांडणीतली उत्स्फूर्तता यामुळे ‘माणसं’ मात्र जगभर जोडली गेली आहेत.’ बोलणं आणि माणसं जोडणं हा अदृश्य पाया ‘ हीच माझी सृष्टीआडची दृष्टी आहे. यातूनच निर्मिलेला एक नवा उद्योग सांगतो नि थांबतो. जगभर ‘आय. टी. कपल’ नोकरीनिमित्त गेली आहेत. मी कार्यक्रमाच्या निमित्तानं जगभरच्या या तरुण तंत्रज्ञांना भेटतो. त्यांचे महाराष्ट्रातले आई-वडील गाठतो. एक दिवस या आजी-आजोबांसमवेत गप्पा मारत त्यांची दैनंदिनी चित्रबद्ध करतो आणि हे सारे चित्रण त्यांच्या परदेशात स्थायिक झालेल्या नातवंडांकडे पाठवतो. या ‘पॅकेजिंग ग्रॅण्डपा’ मोहिमेत मी रमलोय. घरातलं कुणी अचानक गेलं तर ग्रुप फोटोमधला फोटो एन्लार्ज करून त्याला हार घातला जातो आणि ‘हारातलाच चेहरा खरा’ असं पुढच्या पिढय़ा समजतात. त्यामुळे चालते, बोलते, हसते, खेळते आजी-आजोबा असतानाच त्यांना कॅमेऱ्यात बोलकं करत पकडून ठेवा; ही सध्या माझी ‘संवाद मोहीम’ आहे. अर्काइव्हल सेन्स असलेल्यांना या चित्रबद्ध संवादाचं महत्त्व नक्की कळेल.

क्रमशः….

© श्री सुधीर गाडगीळ 

पत्रकार,  निवेदक 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ कै. सिंधुताई सपकाळ विशेष – माई….! ☆ डॉ अभिजीत सोनवणे

डॉ अभिजीत सोनवणे

@doctorforbeggars

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ कै. सिंधुताई सपकाळ विशेष – माई….! ☆ डॉ अभिजीत सोनवणे☆

कै. सिंधुताई सपकाळ

माई…ए माई…उठ ना… अगं किती वाजले ?

तू इतका वेळ कधीच झोपून राहत नाहीस… एक हाक मारली तरी ‘ओ रे बेटा’ असं म्हणून सादेला प्रतिसाद देणारी तू…. ! इतक्या हाका मारून सुद्धा ओ का देत नाहीस… ?

आज अशी अचानक पणे शांत का झालीस ?

तू रागावली आहेस का माझ्यावर ?  खरं सांगू रागवायचा अधिकार आज माझा आहे, आम्हा सर्व लेकरांचा आहे…

सर्वांना असं उघड्यावर टाकून तू जाऊच कशी शकलीस ?

पुस्तकाची प्रस्तावना देताना, जे तू बोलत होतीस ते शेवटचं असणार आहे… हे मला काय माहित ?  नाहीतर तुला बोलण्यात गुंगवून ठेवलं असतं की गं माई…

त्यावेळी डोक्यावर ठेवलेला हात तू असा अचानक काढून घेणार आहेस… हे मला काय माहित ? नाहीतर तो हात मी तसाच गच्च धरून ठेवला असता की गं माई…

दरवेळी तुला भेटायला येताना, तुला आवडतात त्या साड्या मी घेऊन यायचो…. आता इथून पुढे या साड्या मी कोणाला देवू….? गेलीस…. पण जाताना या साड्यांचा भार माझ्या डोक्यावर ठेवून गेलीस की गं माई ….

साड्यांचे बॉक्स मी तुझ्यासमोर उघडताना हि तू अशी… हे बघ अशी…..खुर्चीवर बसलेली असायचीस आणि मी जमिनीवर….

एक एक बॉक्स उघडताना लहान मुलीच्या निरागसतेने, डोक्यावरचा पदर सावरत म्हणायचीस, ‘बेटा गुलबक्षी रंगाची आणली आहेस ना ?’

आज फिकट पडलेल्या या गुलबक्षी रंगाला मी काय उत्तर देऊ माई… सांग की… आज गप्प का ?

मी पुस्तक लिहितो आहे; असं तुझ्या कानावर घातल्यावर, हसत म्हणाली होतीस, फिरकी घेतली होतीस, ‘आता तुम्ही मोठे लेखक होणार बुवा… आम्हाला तुमच्याशी बोलायचं असेल तर अपॉइंटमेंट घ्यावी लागेल आता बाबा तुमची’…

या पुढे म्हणाली होतीस, ‘पहिली प्रत कोणाला देणार आहेस…. ?’

हा काय प्रश्न झाला माई …. ? तुला उत्तर माहीत असून सुद्धा, माझ्या तोंडून तुला वदवून घ्यायचे होते ना …. ?

आता मला सांग…. मी पुस्तकाची पहिली प्रत, तुझ्या पायाशी ठेवायला कुठे येऊ…. ?

जळगावात एकदा एक खूप मोठा… मानाचा… “अविनाशी पुरस्कार” मला मिळाला होता…

तुला कुणी सांगितलं माहित नाही, परंतु मी जळगावात पोचल्याबरोबर तुझा फोन आला होता, ‘बेटा जळगावात रेल्वेस्टेशन समोर अमुक-अमुक झाडाखाली मी सुद्धा एकेकाळी भीक मागत होते,  तिथे तु आत्ता जा आणि तिथं भीक मागणाऱ्या या सर्व लोकांना काहीतरी गोड खाऊ घाल आणि त्यांच्यासाठी जे काही करता येणे तुला शक्य आहे ते सर्व… सर्व… सर्व… कर रे बेटा… बाळा…. माज्या सोन्या…  असं तू तळमळून सांगितलं होतंस…

तुझी ती तळमळ शब्दात मांडण्याची माझी अजून तरी औकात नाही….!

यानंतर मला जे जमलं होतं, ते मी या सर्व याचकांसाठी केलं होतं…. आणि त्याचा लेखी रिपोर्ट तुला फोटोसह दिला होता…. यावर हे सर्व पाहून “माझा वाघाचा बच्चा” असं म्हणून तू मला पोटाशी धरलं होतंस…. !

तुला आठवतं…. ? मी कधीच विसरणार नाही… !!!

अग मी वाघाचा बच्चा कधीच नव्हतो, मी बच्चा होतो “वाघिणीचा” गं …. !

माझ्यासारख्या अशा किती बच्च्याना मागं सोडून गेलीस गं वाघिणी …  ? आणि का… ???

एकदा एका व्यासपीठावर तुझं आणि माझं व्याख्यान ठेवलं होतं…. (माझी लायकी नसतानाही तुझ्या शेजारच्या खुर्चीत मी बसलो होतो)

तुझ्या भाषणात तू पदर पसरून, शेवटी लोकांना म्हणाली होतीस, ‘माझ्या लेकराला…. अभिजीतला पदरात घ्या हो मायबाप…’

तुझ्या या आवाहनाला प्रतिसाद देऊन, समाजाने मला तर पदरात घेतलं ग माई, पण तुझा पदर हरवला…. तो कुठून आणू आता… ??? सांग की आज गप्प का ?

एकदा मोठ्या मनानं म्हणाली होतीस, ‘तू मला माई म्हणतोस, मी तुझी आई झाले…. पण खरं सांगू का ? भीक मागण्याच्या काळात मला तू भेटायला हवा होतास…. तुझी आई होण्यापेक्षा…. तुझी मुलगी होण्यात मला जास्त धन्यता वाटली असती रे बाळा…. !

माई तू शब्द दिला होतास….. सोहमच्या लग्नात मी येईन म्हणून….  !

मोडलास गं हा शब्द माई तू…. सोहमला काय सांगू मी आता…. ? मनीषा ला काय सांगू… ?

तू गेलीस हे समजण्याचं  सोहमचं वय नाही गं माई …. पण मी त्याला सांगितलं आहे, आजी परत येणार आहे….!

तो येडा तुझ्या येण्याची वाट बघतोय….

ए माई… ऐक ना…. सोहमच्या पोटी फिरून जन्माला येशील…. ???

ये की गं…. आयुष्यात मी तुझं सारं ऐकलं…. आता  तू माझं ऐक  ना…. ऐक  की… एकदा तरी….प्लीज….!

तुला माझी मुलगी व्हायचं होतं ना …. ?

सोहमच्या पोटी जन्माला ये…. तोपर्यंत वाट पाहिन मी तुझी….माई… !!!!

आज तुझ्या जाण्याने एक मात्र निश्चित जाणीव झाली…. देवाला सुद्धा आई हवी असते…. !!!

 

तुझे अभागी …

अभिजीत… मनीषा आणि सोहम

चित्र साभार – sindhutaisapakal.org

© डॉ. अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ बोलता बोलता भाग 5 ☆ श्री सुधीर गाडगीळ

? मनमंजुषेतून ?

☆ बोलता बोलता भाग 5 ☆ श्री सुधीर गाडगीळ ☆

मुळात मुंबईचं राजकारण- सिनेमा- जाहिरातींचं विश्व मला जवळून अनुभवता आलं ते एका वेगळ्याच साप्ताहिकामुळे. आज बऱ्याच नव्या पत्रकारांना ते साप्ताहिक माहीतही नसेल. ते साप्ताहिक म्हणजे ‘तेजस्वी’. चौगुले आणि किर्लोस्कर या दोन उद्योगपतींनी निर्मिलेले. विविध दैनिकांतून ज्येष्ठ नामवंत पत्रकार (सुमारे चाळीस) या नव्या साप्ताहिकांत रुजू झालेले होते.

 किर्लोस्करांचे जनसंपर्क अधिकारी नारायण पुराणिक सूत्रधार संपादक होते. ‘इंडिया टुडे’ येण्यापूर्वीच तसं वृत्त- साप्ताहिक मराठीत आणण्याचा हा ‘तेजस्वी’ प्रयत्न होता. त्याचं ऑफिस पुण्यात मोदी बागेत होतं. मला आठवतंय, त्या वेळी राजकारणाची जाण असलेल्या वरुणराज भिडेला पुराणिकांकडे इंटरव्ह्य़ूला घेऊन मीच गेलो होतो. त्या ‘तेजस्वी’चा मुंबई मुख्य प्रतिनिधी म्हणून माझी त्या माझ्या उमेदवारी काळात नेमणूक झाली होती. माझी निवड होण्याचं कारण फक्त मी मुंबईत जायला तयार असणं एवढंच होतं. त्यावेळी मी उल्हास पवारांच्या जुन्या आमदार निवासातल्या रुम नं. ६०२ मध्ये बऱ्याचदा असायचो. मधू शेटय़े, गोगल मला त्या वेळी खूप मदत करत. पदच असं होतं की, वसंतराव नाईक, अंतुलेंसह सर्व राजकीय नेते, उद्योजक तर सहजतेनं भेटत. मला आठवतंय की, वडखळ नाकाप्रकरणी बॅ. ए.आर.अंतुले, रामभाऊ म्हाळगी, प्रमोद नवलकर, मृणाल गोरे यांच्या मुलाखती मी घेतल्या होत्या. १९७१-७२ सालातले सारे ‘तेजस्वी’चे अंक माझ्याकडे आहेत.

मुलाखतींच्या राज्यातही अनेक गमती घडल्या आहेत. मी आणि वरुण भिडे ‘अर्न अ‍ॅण्ड लर्न’ स्कीमखाली कॉलेजात शिकत असतानाच्या काळात रेस्टॉरंट नसलेल्या ‘श्रेयस’ हॉटेलात अटलबिहारी वाजपेयीसाहेबांबरोबर सहज गप्पा झाल्यात. तर राजकीय नेत्यांमध्ये सर्वाधिक मुलाखती बाळासाहेब ठाकरे आणि शरदराव पवार यांच्याबरोबर झाल्या आहेत. २४ एप्रिल २०१२ षण्मुखानंद हॉलमध्ये दीदींच्या उपस्थितीत बाळासाहेब शेवटचे भेटले. ७, सफदरजंग रोड, दिल्ली या प्रमोद महाजनांच्या तत्कालीन निवासस्थानी सलग सात तास चित्रबद्ध केलेली महाजनांची मुलाखत शेवटची ठरेल, असं वाटलं नव्हतं. राज ठाकरे- उद्धव ठाकरे यांनी आपलं पद- ग्लॅमर विसरून मुक्त गप्पा मारल्या आहेत.

यशवंतराव चव्हाणसाहेबांशी पुस्तकांवर त्यांच्या निवृत्ती काळात चतु:शृंगी पायथ्याशी बोललोय तर पृथ्वीराज बाबांशी अगदी अलीकडे सॅटर्डे क्लबमध्ये धावत्या गर्दीत बोललोय. हे दोन ‘चव्हाण’ आणि कन्नमवार सोडल्यास वसंतराव नाईक ते देवेन्द्र फडणवीस सर्व मुख्यमंत्र्यांच्या मुलाखती झाल्या आहेत. विलासराव देशमुख आणि सुशीलकुमारजी तर आमच्या कट्टय़ावरच्या गप्पाष्टकातही सहभागी झालेत.

नवी गाडी ‘मनोहर’ साप्ताहिकाच्या कचेरीत दाखवायला आलेला आणि बिनधास्त बोलणारा ‘नामदेव ढसाळ’ तर त्या काळात दोस्तच झाला होता. आळंदीच्या साहित्य संमेलनात अक्षरश: रस्त्यावरच्या धुळीत बसून, दया पवार मुक्तपणे जीवन कहाणी ऐकवताना मी एकटय़ाने अनुभवले आहेत. नितीन गडकरी- गोपीनाथ मुंडे यांनी खासगी विमान प्रवासातही स्टुडिओत बसल्याप्रमाणे सहज मुलाखती दिलेल्या आहेत.

क्रमशः….

© श्री सुधीर गाडगीळ 

पत्रकार,  निवेदक 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ बोलता बोलता भाग 4 ☆ श्री सुधीर गाडगीळ

? मनमंजुषेतून ?

☆ बोलता बोलता भाग 4 ☆ श्री सुधीर गाडगीळ ☆

बृहन्महाराष्ट्र कॉमर्स कॉलेजात शिकत असतानाच पत्रकारिता केल्याने, विविध क्षेत्रीच्या थोरा-मोठय़ांकडे सहजतेनं जाता आलं आणि त्यातून नव्यानं सुरू झालेल्या ‘दूरदर्शन’ साठी नव-नवे विषय सुचवू शकलो. व्यंकटेश माडगूळकर, ना. ग. गोरे, लालचंद हिराचंद, आबासाहेब गरवारे, शकुंतला परांजपे, बाळासाहेब ठाकरे अशा ५० नामवंतांच्या तरुणपणीचे अनुभव, त्यांचं करिअर घडणं, पत्रकारितेच्या निमित्ताने ऐकता ऐकता, ‘दूरदर्शन’साठी ‘आमची पंचविशी’ ही मुलाखत मालिका वर्षभर केली. तर नामवंतांच्या घरातील मुलांशी बोलण्यातून जान्हवी प्रभाकर पणशीकर, कीर्ती जयराम शिलेदार, जयंत भीमसेन जोशी, रमेश स्नेहल भाटकर, श्रीधर सुधीर फडके अशा कित्येक मुलांची मानसिकता समजून घेणारा, ‘वलयांकित’ हा कार्यक्रम ‘दूरदर्शन’वर करू शकलो. डेक्कन क्वीननं प्रवास करताना पुणे स्टेशनवर डेक्कन क्वीनच्या डब्यावर हात ठेवणारा उंच मुलगा पाहून वर्षभरात वेगळी वाटणारी पन्नास माणसं ‘ मुलुखावेगळी माणसे ’मध्ये आणू शकलो.

जितेन्द्र अभिषेकीबुवांशी गप्पा मारत, गाणं समजून घेत, ‘मत्स्यगंधा ते महानंदा ’ हा अभिषेकी संगीताचा कार्यक्रम (कामत, आशाताई, राजा काळे आदींसह) जयराम, जयमाला- कीर्ती- लता- किरण भोगलेशी बोलत, ‘गंधर्व सुरांची शिलेदारी’, गोव्याच्या समुद्रावर काकतकरच्या साथीनं जाऊन, बाकीबाबांशी गप्पा मारत, ‘कांचनसंध्या’ असे गाण्यांचे कार्यक्रम करू शकलो. हे सारं ‘नक्षत्रांचं देणे’ संकल्पना येण्यापूर्वी ! फक्त ‘मंतरलेल्या चैत्रबनात’ कार्यक्रमात अडकून न पडता, ‘स्मरणयात्रे’च्या कोषात न थांबता, दगडूशेठ गणपतीच्या शतकोत्सवात सारसबागेच्या मैदानावर गजानन वाटवे, ज्योत्स्ना भोळे, मालती पांडे, पं. हृदयनाथ मंगेशकर, अरुण दाते, श्रीधर फडके अशा भावगीतकारांच्या तीन पिढय़ा सादर करू शकलो. अरुणभय्या आणि बाळासाहेब मंगेशकर यांचे स्वतंत्र कार्यक्रमही सूत्रबद्ध केले. अरुण काकतकरांमुळे भारतरत्न लता मंगेशकर, आशा भोसले, उषाताई, मीनाताई, हृदयनाथजी, अशा पाचही मंगेशकर भावंडांच्या मुलाखती आणि गाणी ‘दूरदर्शन’वर प्रथम सादर करण्याची संधी मला मिळाली. आणि आशा भोसलेंच्या मुलाखती- गाण्यांचे कार्यक्रम तर गेली २७ वर्षे करत आलोय. भेटलेल्या माणसांच्या गप्पांच्या नोंदी रोज रात्री रोजनिशीत नोंदवायची सवय असल्याने, संदर्भाच्या साडेतीन हजार फायली (माझ्या आरंभकाळात कॉम्प्युटर सोय नव्हती) सांभाळून आहे. त्यामुळे प्रत्येक क्षेत्रातल्या किमान दोन पिढय़ांशी रंगमंचावरून, कॅमेऱ्यासमोर मुलाखतवजा- संवाद सहजतेनं जमवू शकलोय.

मॉरिशसला व्यासपीठावर माणिकबाई वर्माना घेऊन आलेल्या पु. ल. देशपांडे यांच्या (माझी फिरकी घेणाऱ्या) उत्स्फूर्त वक्तव्यानं अस्वस्थ न होता, सभ्य प्रतिउत्तर देऊ शकलोय ते माहितीचे संदर्भ सतत ताजे ठेवण्यामुळे ! माणिकताईंच्या गाण्यातून अनेकांची प्रेमं फुलली असल्याने मी त्यांना विचारलं की, ‘‘माणिकताई, माणिक दादरकरची माणिक वर्मा होताना तुम्हाला तुमचं कुठलं भावगीत उपयोगी पडलं?’’ यावर माणिकताईंनी काही उत्तर द्यायच्या आधीच, त्यांच्या बाजूला उभे असलेले पु. ल. देशपांडे म्हणाले, ‘‘अरे सुधीर, तिच्या वर्मावर कशाला घाला घालतोयस?’’ यावर पु.लं.कडे बघत मी पटकन उत्तरलो, ‘‘मी कोण त्यांच्या वर्मावर घाला घालणार? त्यांचा ‘वर्मा’ ‘अमर’ आहे.’’ या उत्स्फूर्ततेला पु.लं.नीही ‘दाद’ दिली.

मला नामवंतांशी संवाद साधण्याच्या संधी खूप मिळाल्या. हिंदी अभिनेते-अभिनेत्रींच्या जवळ जाता आलं ते देवयानी चौबळ नामक सत्तरच्या दशकात फिल्म जर्नालिझममध्ये टेरर असलेल्या ‘स्टार अ‍ॅण्ड स्टाइल’च्या संपादक ज्येष्ठ मैत्रिणीमुळे. ‘मनोहर’ साप्ताहिकात मी काम करत असताना, आमच्याकडे त्या ‘चंदेरी च्युइंगम’ सदर लिहायच्या. दत्ता सराफांनी चौबळसंपर्काची जबाबदारी माझ्यावर सोपवली होती. त्या हाजीअलीसमोर एनएससीआय क्लबवर राहायच्या. दर बुधवारी मी मुंबईला त्यांच्याकडे जायचो. त्या मला घेऊन थेट हिंदी ग्लॅमरस पाटर्य़ाना, नटांच्या घरी घेऊन जायच्या. त्यामुळे इंग्रजी फिल्मी मासिकांची भाषांतरं न करता थेट बातम्या मिळायच्या. राजेश खन्नाच्या साखरपुडय़ाला, धर्मेद्रच्या मारहाणीला मी साक्षी होतो.

© श्री सुधीर गाडगीळ 

पत्रकार,  निवेदक 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares