मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆  व्यूह आणि रचना ☆ श्री अरविंद लिमये

श्री अरविंद लिमये

☆ मनमंजुषेतून ☆  व्यूह आणि रचना ☆ श्री अरविंद लिमये ☆

मराठी भाषेच्या शब्दसौंदर्याइतकाच तिचे शब्दसामर्थ्य हाही सखोल अभ्यासाचा विषय आहे. व्यूह हा शब्द याचीच प्रचिती देणारा वाटतो. चांगले आणि वाईट असे दोन्ही अर्थ ल्यालेला हा शब्द!बेत, योजना, धोरण, युक्ति, हे जसे सकारात्मकता ध्वनीत करणारे अर्थ, तसेच कट, कारस्थान, डाव, डावपेच असे नकारात्मकतेच्या कृष्णछायाही याच शब्दाच्या. . ! युध्दात युध्दनीति, रणनीति ठरवताना शत्रुपक्षाच्या कसब/कुवतीचा अंदाज/अभ्यास जसा महत्वाचा तसाच त्यांच्या रणनीतिला छेद देण्यासाठी बुध्दीकौशल्यही तेवढेच आवश्यक. . ! हे बुध्दीकौशल्य अपरिहार्य ठरतं जेव्हा शत्रूपक्ष सर्वार्थाने प्रबळ असतो. ठाम निर्धार, खंबीर मन,  संघटन कौशल्यआणि उत्कट राष्ट्रप्रेम याच मुख्य भांडवलाला तीव्र बुध्दीमत्तेची जोड मिळाली आणि शिवाजीमहाराजांनी अतिशय प्रबळ मोगलसम्राटाशी लढताना युध्दनिती ठरवली ती स्वनिर्मित अशा ‘गनिमी कावा’या संकल्पनेनुसार. . !

व्यूह या शब्दाला रचनाकौशल्याची जोडही तेवढीच आवश्यक असते. विशेषत: बुद्धीबळासारख्या खेळात(लुटूपुटूच्या लढाईत)सुध्दा व्यूहरचनाकौशल्य अपरिहार्यच. . !

युध्दरचना, युध्दनीति यांची कसोटी लागते ती रणांगणावर हे कालपरवापर्यंतचं

वास्तव होतं. पण कालौघात व्यूहरचनेची गरज ही आज कुटुंबव्यवस्थेलाच खिळखिळी करु पहात आहे. सहजीवनातील अस्वस्थता, घटस्फोटांचं वाढत चाललेलं प्रमाण ही कौटुंबिक पातळीवरील छुप्या युध्दाचीच परिणती. या रणांगणावर व्यूह शब्दाचे नकारात्मक अर्थच ठळक होतात आणि ते सार्थ ठरवायला कट कारस्थानं प्रबळ होतात. टोकाचा आत्मकेंद्रीपणा नात्यातला गोडवा शोषून घेत स्वत; पुष्ट होत जातो आणि युध्दशस्त्रं परजली जातात. परस्पर सामंजस्य रणांगणावरील युध्दविरामासाठी अपरिहार्य असतं तसंच गृहकलहातही. देवाणघेवाण तिथल्यासारखी इथेही. पण इथे त्याची जाणिव  व्हायची तर ती उशीरा सुचलेल्या शहाणपणा सारखी नसावी हे आवर्जून सांगावंसं वाटतं. कारण त्या युध्दांच्या बाबतीत रम्य वगैरे असणार्या ’ युध्दस्य कथा’ या प्रकारच्या युध्दात मात्र अतिशय क्लेशकारक असतात. . . !

 

© श्री अरविंद लिमये

सांगली.

≈ श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मनोबल ☆ सुश्री अनुराधा फाटक

☆ मनमंजुषेतून ☆ मनोबल ☆ सुश्री अनुराधा फाटक

मन हे माणसाचे सहावे इंद्रिय आहे.नाक,कान,डोळे, रसना आणि त्वचा या पाच ज्ञानेंद्रियांना माणूस जेवढा ओळखतो त्याच्या पावपटही तो या सहाव्या इंद्रियाला ओळखत नाही.त्याचे सर्वात महत्वाचे कारण ही पाच ज्ञानेंद्रिये शरीरबाह्य आहेत आणि मन हे देहान्तर्गत आहे.जशी पाच ज्ञानेंद्रिये आपण दाखवू शकतो तसे मन दाखविता येत नाही.

मन दिसत नसले तरी सर्व इंद्रियामध्ये ते बलवान असते.सर्वावर त्याची सत्ता असते.जेव्हा माणसतली राक्षसी वृती जागृत होते माणसाचे मनोबल त्याला दुष्कृत्य करण्यास भाग पाडते.ही मानवी जीवनाच्या

विनाशाची सुरवातच म्हणावी लागेल.माणसाचे पहिले दुष्कृत्य म्हणजे सुधाकराचा एकच प्याला असतो.

हे लक्षात घेऊन आपण आपले मनोबल विधायक कामासाठी वापरले पाहिजे.विधायक कामासाठी मनही सदाचारी होणे महत्वाचे!

मन सदाचारी बनवायचे असेल तर आपल्या सहा शत्रूंना आपण जिंकले पाहिजे.हे सहा शत्रू म्हणजे काम,क्रोध, मद, मत्सर, लोभ! त्याना जिंकणे तसे सोपे नसते तरीही प्रतत्नपूर्वक सोपे करण्याचा प्रयत्न अशक्य नसतो. भूतकाळातील चांगल्या घटना, आठवणीना उजाळा देत आपण सकारात्मक विचार करू शकतो,आपल्या शत्रूंना आपल्यापासून दूर करण्याच्या प्रयत्नात हळूहळू यशस्वी होऊ शकतो.अशा यशस्वी होण्याने आपोआपच आपले मनोबल वाढते.

आनंद हे सुध्दा मनोबल वाढविण्याचे महत्वाचे कारण होऊ शकते.त्यामुळेच आपली आनंदीवृत्ती सहजपणे संकटाशी सामना करू शकते .प्रत्येकाने आनंदीवृत्ती जोपासून आपले मनोबल वाढविले जगणे सोपे होईल.अर्थात प्रत्येकाचे आनंद मिळवण्याचे मार्ग निश्चितच वेगळे असतात.

मनोबल वाढण्यासाठी सकारात्मक दृष्टीकोन फार महत्वाचा असतो.एखादा पाण्याने अर्धा भरलेला पेला बघताना तो अर्धा भरला आहे म्हणायचे की अर्धा रिकामा आहे म्हणायचे हे जसे त्या पेल्याकडं बघण्याच्या दृष्टीकोनावर अवलंबून असते तसेच मनोबलाचे असते.मानवी जीवनाच्या विकसासाठी सकारात्मक मनोबल उपयोगी पडते.जगायचेच आहे तर स्वप्नपूर्तीच्या मनोरथावर स्वार व्हावे म्हणजे जीवन यशस्वी होईल.

 

©  सुश्री अनुराधा फाटक

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ सखी ☆ सौ. सुनिता अनंत गाडगीळ

☆ मनमंजुषेतून ☆ सखी ☆ सौ. सुनिता अनंत गाडगीळ ☆

कॅन्सर हॉस्पिटल मधला एक वॉर्ड. सेमी स्पेशल रूम मध्ये एका बेडवर मी आणि दुसऱ्या बेडवर कॅन्सर झालेल्या एक वयस्क बाई.

डोक्याचा गोटा, कातडी करपलेली. अंगातला तरतरीतपणा निघून गेलेला. अंगभर थकवा.डोळ्यावर ग्लानी. पुढची इंजेक्शन मागवण्यासाठी मी मोबाईल शोधत होते. माझ्या जवळ कोणी नव्हते. तो मोबाईल सापडेना.

त्यावेळी एक तरुणी माझ्याजवळ येऊन विचारत होती,” काय पाहिजे?” ती एक चिठ्ठी तिच्या हातात देत मी म्हटलं हे प्रिस्क्रिप्शन जरा धरुन ठेवा, जाईल कुठेतरी मोबाईलच्या नादात. “काकू, मी धरून ठेवते तुमच्या हातातली चिठ्ठी. तुमची औषध आणायची आहेत  ? कारण आईची आणायची आहेत.” ती तरुणी म्हणाली.

ती तरुणी या बाईला आई म्हणत होती. दोघींमध्ये कसलं साम्य दिसत नव्हत. हा विचार माझ्या मनात घोळत होता. ती तरुणी गेली. नंतर त्या बाई जाग्या झाल्या आणि आजूबाजूला बघून रडायलाच लागल्या. मी त्यांना विचारलं,” काय झालं रडू नका” त्या म्हणाल्या ‘आमची सून पौर्णिमा कुठे गेली ?मला घाई लागली आहे संडासला आणि उठता येईना.’ एवढं बोलण्यानंच त्या खुप  दमल्या. .दोघींची औषध घेऊन पौर्णिमा परतली होती. यावेळी अंथरूण घाणीने भरलं होतं. ते बघून तिने नर्सला बोलवलं .मला रूम बाहेर बसवलं आणि नर्स च्या मदतीने सगळे स्वच्छ केलं .

आता रडत म्हणाली,” काकू सॉरी हा .आता तुम्ही आत येऊन बसा. पहिल्यांदाच झालं असं आईला”. त्या हुंदके देत होत्या. त्यांचे मन हलकं झालं होतं. गदगदत होत्या. “तुझ्यावर काय वेळ आली ग बाळा “असे म्हणून त्या पुन्हा पुन्हा डोळे पुसत होत्या .”आई ,तू जर चांगली असतीस तर मला करायला लागलं असतं का ? तुला होणारे त्रास जास्त आहेत . नाहीतर तू तरी माझ्याकडून कधी असं करून घेतलं असतं का? तू त्रास नको ना करून घेऊ ,असं म्हणत पौर्णिमा त्यांच्या पाठीवरून हात फिरवत त्यांना धीर देत होती .धीर देऊन झाला .आता त्यांना गोळ्या द्या असे नर्स सांगून गेली.”मी आता तुझ्यासाठी जेवायला घेऊन येते पटकन “असं म्हणत गोळ्या च्या पाकीट मधल्या गोळ्या काढून बाहेर  पडत पूर्णीमा म्हणाली की “मी तुम्हाला काहीतरी खायला आणून देते.”

आईचा आवाज व्याकुळ झाला होता. “नको मला नको काही खायला.”

“आई कसं चालेल ?जेवणापूर्वी च्या दोन गोळ्या आहेत, जेवायला पाहिजे ,” पौर्णिमा म्हणाली.  “असं कर ,फार नको अर्धी किंवा चतकोर भाकरी खाऊन घे. त्यावर पोर्णिमा म्हणाली ,अर्धी भाकरी करणारी बाई कोण मिळते ते विचारून येते थांब.

पौर्णिमा खळखळून हसत म्हणाली .त्यावर आई हसत म्हणाली ,”हसू नकोस ग बाई. हसताना दम येतो बर का.  .नुसती निजून आहे ना मी. कमी खायला हवं ” त्या मुलीला आपलं किती करावे लागत हे जाणवल्याने आई त्यामुळे खरंतर तसं बोलत होती. सलाईन लावलेला हात सुजला होता आणि नात्याच्या ऋणातून गुरफटून जात मी त्यांच्यात अडकत होते. मघाच्या  नर्स आल्या .इंजेक्शन देऊन त्यांनी सलाईनचा स्पीड कमी केला, तेव्हा मात्र इतका वेळ कसाबसा धरून ठेवलेला त्यांचा धीर सुटला हात सुजला होता. त्या रडू लागल्या.

पूर्णिमाने त्यांचा हात सलाईन मधून सोडवायला लावला आणि सोडवलेल्या सलाईन काढलेल्या नळीला दाबून दाबून ती आईला हसवण्यासाठी विचारत होती “इथं दाबू. आता इथं दाबू ? ” सलाईन काढलेल्या आईच्या हातात घेऊन ती बसली होती..आता खरं तर ती आईची आई झाली होती. सासू-सुनेचं ते मैत्र बघून मला अपूर्वाई वाटत होती.

आताशा अहो जाहो सोडून अग जगं सासूला म्हटलं जातं. आपल्या  सासूची सखी झालेली ती सून मी कशी विसरेन? तिथल्या वास्तव्यात आमच्या खूप गप्पा झाल्या ते मैत्र मी आजवर जपून ठेवले आहे.

 

© सौ. सुनिता अनंत गाडगीळ

9420761837

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ भक्तीसंगम ☆ श्री अमोल अनंत केळकर

श्री अमोल अनंत केळकर

☆  मनमंजुषेतून : भक्तीसंगम ☆ श्री अमोल अनंत केळकर

मंडळी नमस्कार ??

आषाढ महिना संपत आला की धरण क्षेत्रातील पावसाने वाढलेल्या पाण्याच्या बातम्या लक्ष वेधून घेतात. अमुक पूल पाण्याखाली गेला, अमुक धरणं  क्षमतेच्या इतकी भरली , तमुक गावाचा संपर्क तुटला , या धरणातून अमुक तमुक क्षमतेचा विसर्ग चालू , हा बंधारा भरून वाहू लागला  इ इ.

अशावेळी  अनेक ठिकाणी  एक अपूर्व  दृश्य पहावयास मिळते.  यात प्रामुख्याने उल्लेख करता येईल तो म्हणजे नरसोबावाडीच्या  (जिल्हा. कोल्हापूर ) ” दक्षिणद्वार ” सोहळ्याचा कृष्णा आणि पंचगंगा  यांच्या संगमावर असलेले नरसोबावाडी हे एक पवित्र धार्मिक तीर्थक्षेत्र. कोल्हापूर जिल्ह्यातील मुसळधार पावसाने पंचगंगा ( जणू  पाच भगिनी) दुथडी भरून वाहू लागते. त्याचवेळी सातारा, सांगली  जिल्ह्यातील पावसाने  महाबळेश्वर, कोयना पाणलोट क्षेत्र, कोयना धरणातील पाण्याचा उत्सर्ग, चांदोली धरणातील उत्सर्ग  यामुळे  कृष्णा, कोयना, वारणा या नद्या आनंदाने फुलून जाऊन पात्राच्या बाहेर पडून दक्षिण दिशेकडून नरसोबावाडीला  येतात आणि एका अनोख्या भेटीसाठी  ‘सप्त कन्या’ आणि त्यांची ‘कृष्णा माई’ सज्ज होतात.

या मिळून सा-याजणींची  “परब्रह्म भेटीलागी ”  अशी अवस्था होऊन जाते आणि मग या सगळ्याजणी  सरळ पोचतात ते  श्री नरसिह सरस्वती यांच्या ‘ मनोहर पादुकांवर ‘ जलाभिषेक करण्यासाठी “शक्ती आणि भक्ती  यांचा हा  अनोखा संगम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त चा जयघोष करत मग इतर भाविक  या भक्ती संगमाचा “याची देही ” अनुभव घेऊन भक्तीरसात चिंब होऊन जातात.

असा हा विलक्षण  दक्षिणद्वार सोहळा, दरवर्षी पावसाळ्यात दोन – तीन वेळा तरी अनुभवास येतो.

नरसोबावाडीस पोहोचण्यापुर्वी  या सगळ्या नद्या वाटेत अनेक ठिकाणी   अनेक गावातील  घाटांवरच्या देवळातील ‘ चैतन्याला ‘  स्पर्श करून आलेल्या असतात. काही उदाहरणे द्यायची झाल्यास कृष्णेने  वाईच्या ढोल्या  गणपतीच्या गाभा-यात जाऊन घेतलेले दर्शन किंवा कृष्णेचेच  औदूंबरला दत्त गुरु चरणी घातलेले लोटांगण सांगता येतील.

अगदी असंच त्र्यंबकेश्वरहून उगम पावणारी ‘गोदा’ त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेऊन नाशिकला  ‘प्रभू श्री रामचंद्रा ‘ चरणी लीन  झालेली पहावयास मिळते.  माऊलीच्या भेटीसाठी आसुसलेली ‘इंद्रायणी’ हे आणखी एक उदाहरण. अशी अनेक उदाहरणे आपणसा  इतरत्रही पहावयास मिळतात.

नद्यांना या ” परब्रह्म भेटीच्या ओढीचे”  मूळ  माझ्यामते  फार पूर्वी पासून आहे. जेंव्हा श्रावण कृष्ण अष्टमीला  छोट्या गोविंदाला घेऊन ‘ कंसा ‘ पासून सुरक्षीत स्थळी  नेण्यासाठी जेंव्हा वासुदेव निघाले होते. ‘यमुनेला’ ही वाटलंच की  या देवकी पुत्राच्या छोट्या पावलांना स्पर्श करावा असं.  सोमवती अमावस्येला  ओंकारेश्वराच्या दर्शनाहून परत बोटीतून येताना ‘श्री गजानन महाराजांच्या’ बोटीला खालच्या बाजूने छिद्र पडले. नावेत पाणी  जाऊ लागले. इतर भक्त मंडळी घाबरली पण इथे ही ‘नर्मदा’ “राजाधीराज योगीराज परब्रह्म गजानन महाराजांचे” चरण स्पर्श करण्यासाठी आली होती.

आषाढ महिन्यात पांडूरंगाच्या भेटीसाठी तहान भूक विसरून निघालेले वारकरी  आणि याच आषाढ – श्रावणात परब्रह्ममाच्या भेटी साठी निघालेल्या या नद्या  यात मला तरी काही फरक वाटत नाही .  हे कालचक्र, जीवन असेच प्रवाहित राहील जोपर्यत ‘भेटीची ही आस ‘ निरंतर राहील आणि  एकदा का ही भेट झाली की मग फक्त जाणवेल.

तुझा श्वास माझा ध्यास नुरे दुजे काही

तुझी भक्ती माझी मुक्ती भरे दिशा दाही

विश्व् आत्मरुपी  अवघे एकरूप झाले

परब्रह्म भेटी लागी धरेवरी आले

सूर सूर चैत्यनाचा रोमरोम झाले

???

देवा तुझ्या द्वारी आलो

 

©  श्री अमोल अनंत केळकर

नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मी कडून आम्ही कडे… ☆ प्रा.सौ. सुमती पवार

प्रा.सौ. सुमती पवार

☆ मनमंजुषेतून : मी कडून आम्ही कडे… ☆ प्रा.सौ.सुमती पवार ☆

सुशिला ताई आज सकाळ पासूनच हिरमुसल्या होत्या .चेहरा पडला होता. दुखावल्या सारख्या वाटत होत्या. ….

श्रीपतराव म्हणाले , काय ग ? काय झालं ? चेहरा का पडला तुझा ….?

खोदून खोदून विचारल्यावर म्हणाल्या,अहो , “आज काल घरात काही किंमतच राहिली नाही आपल्याला …? अगदी अडगळीत पडल्या सारखे वाटते पहा … कां ? काय झाले …श्रीपतराव म्हणाले… अहो, हल्ली घरात काय चालले आहे कळतच नाही…कोणी सांगत नाही की विचारत नाही…

श्रीपतरावांना हसू आले ..अस्सं होय …! ते म्हणाले , लग्न होऊन तू इथे शहरात आलीस नि …लगेचच तू स्वतंत्र झालीस , तेंव्हा तू विचारलेस का कोणाला काही .? मग मात्र त्या गप्प बसल्या …!

अगं .. स्वातंत्र्य सर्वांनाच हवं असतं नि आता आपला संसार तो कितीसा राहिला आहे..? काही कमी आहे का तुला कशाची ..? मग रहा ना सुखात ? का दु:ख्ख शोधतेस..?

खरं आहे …माणूस दु:ख्ख शोधतो. मी…मी…मी …मी….आणि फक्त मीच …!

मला विचारलं नाही … मला सांगितलं नाही

हा …”मी “ च आपल्याला संघर्षाकडे , सर्व-नाशाकडे घेऊन जातो. मी मोठा , मी प्रमुख , मी नेता ,मी कारभारी,राम ..राम राम..राम.. किती धुडगुस घालतो हा मी ?

माझे घर , माझी इस्टेट ,माझी बायको, माझी मुले… हा अहं इतका सुखावतो या शब्दांनी…की विचारू नका ….! पण आपण त्या मुळे किती दु:ख्ख मागून घेतो याची कल्पना

नसते आपल्याला …! पुराणात इतिहासांत खूप दाखले आहेत याचे…..! जग जिंकलेला सिकंदर त्या मुळे वयाच्या अवघ्या ३७ साव्या वर्षी सुख न भोगताच मरण पावला …!

काय मिळवले जग जिंकून त्याने …! घरा पासून जगा पर्यंत सर्वत्र हा मी आहे ….! आणि त्या मुळे संघर्ष वाढतो .मी आक्रमण करणार .. मी सत्ता गाजवणार ..जगभर या मी चा प्रताप आपल्याला दिसतो …

“म्हणून या मी चा आम्ही झाला पाहिजे”

अगदी बाल पणापासून या मी ची एवढी प्रचंड वाढ झालेली दिसते की , माझे खेळणे ,माझे दप्तर ,…मी देणार नाही …हा मी एवढा फोफावतो की,शेजारी राहून आपण एकमेकांचे शत्रू बनतो. सर्वत्र हेच चित्रं दिसतं.भिकाऱ्या पासून सम्राटा पर्यंत हा रोग पसरलेला आहे.आपण त्याचे दुष्परिणामही भोगत आहोत .

पण तरी ही या “मी” चे प्रस्थ कमी न होता दिवसेंदिवस वाढतंच चालले आहे.जगात कुठेही जा ..मी चा फणा उभारलेलाच असतो.

माझा धर्म , माझा देव ,माझे राष्ट्र ,माझे माझे आणि माझे… अत्यंत आत्मकेंद्री ,स्वार्थी असा हा मी हा अत्यंत घातक रोग आहे… हा मी सतत माणसाला पोखरत असतो. दुसऱ्याशी तुलना करायला भाग पाडतो.

आपल्या जवळ जे जे आहे त्याचा उपभोग न घेऊ देता हा मी सतत मागणी करत रहातो. हा मी… स्वत: ही जळतो व दुसऱ्यालाही जाळतो.

म्हणून तो आधी मनातून व जनातून हद्दपार झाला पाहिजे …ही आम्ही ची भाषा आपण घरातूनच निर्माण केली पाहिजे .आपले घर आपला समाज , आपले राष्ट्र ,आपले जग अशी भाषा जाणिवपूर्वक जन्माला घातली पाहिजे .. कारण नाती टिकली तर समाज टिकतो व समाज टिकला तरच एकराष्ट्र उभे राहते…

एका बेटा पेक्षा मुठीची ताकद फार मोठी असते. मग त्या वज्रमुठी पुढे एकसंघ भावने पुढे कुणाचे काही चालत नाही .. तर घरा पासूनच  या मी ला घालवून आमचा समाज निर्माण होईल आणि आमचा देश, आमचे राष्ट्र निर्माण होईल त्या दिशेने आपण प्रयत्न करू या …व आमचा देश , मग आमचे विश्व असा अभिमान बाळगू या ..सौहार्दाचा हात पुढे केल्यास काही ही अशक्य नाही..फक्त सुरूवात व्हायला हवी ती आपण करू …

वंदे मातरंम् कडून राष्ट्रागीता कडे व मग विश्व बधुत्वाकडे वाटचाल करू या …..

।।जय विश्व बंधुत्व ।।

© प्रा.सौ.सुमती पवार ,नाशिक

(९७६३६०५६४२)

[email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ साक्षात्कार … ☆ श्री रवींद्र पां. कानिटकर

☆ मनमंजुषेतून : साक्षात्कार… ☆  श्री रवींद्र पां. कानिटकर 

आमच्या घराच्या बागेत आंबा, पेरु, नारळ, सिताफळ अशी अनेक फळझाडे आहेत. जास्वंदी,जाई, जुई,मोगरा, अबोली, गोकर्ण, गौरी अशी मनमोहक फुलझाडे बहरलेली असतात. फुलझाडांना येणाऱ्या कळ्या, हळुवार उमलणारी फुले, अंगणात दरवळणारा सुगंध तासनतास राहतो. सुगंधाने मन उल्हसित होतेच त्याबरोबर निसर्गाचे अनाकलनीय चमत्कार ही अनुभवायास येतात.

दरवर्षी मे महिन्यात अतिशय चविष्ट, मोठमोठाले भरपूर आंबे येतात. पावसाळ्याच्या सुरुवातीला भरपूर पेरु, पावसाळ्यात सिताफळे, बारमाही नारळ अशा अनेक फळांची आमचे येथे रेलचेल असते. उन्हाळ्यात आंबे पाडाला आले की ते अलगदपणे काढून घरातच अढी घालण्याचा आमचेकडे जणू एक कार्यक्रमच असतो. त्यातल्या त्यात कच्च्या आंब्यांचे पन्हे,चटणी, चैत्रातील आंबा घालून केलेली हरभराडाळीची कोशिंबीर यांची चव जीभेवर बराच कळ रेंगाळते. हळूहळू, आंब्याच्या आंबट गोड वासिने घर भरून जाते. आंबे पिकत आले की ते आमच्या मित्रांना, गल्लीतील ओळखिच्या लोकांना तसेच गावातील नातेवाईकांना देण्याचा दरवर्षीचा आमचा रिवाज आहे. कुणाला आंबे द्यायचे चुकून विसरलेच तर ते स्वतः आवर्जून, अगदी हक्काने आंबे घेऊन जातात. आम्हालाही त्यांच्या आनंदात सहभागी व्हायला आवडते.

दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आंब्याच्या झाडातून मोहोर हळुहळू डोकावू लागला. शिवरात्रीला शंकराला आंब्याचा मोहोर वाहून भरपूर आंबे येवोत अशी प्रार्थना केली जाते. वाऱ्याच्या झुळुकेबरोबर मोहराचा मंद सुवास संध्याकाळी घर भारून टाकतो.

परराज्यात राहणाऱ्या आमच्या मुलीने फारच हट्ट केल्याने व तिलाही एकटीला थोडी सोबत व्हावी या उद्देशाने आम्ही उभयता मार्च 2020 च्या पहिल्या आठवड्यात तिच्याकडे गेलो. माझी पत्नी थोडे जास्त दिवस तिथे राहणार होती. मी मात्र 15-20 दिवसांनी, म्हणजे मार्च 2020 अखेरीस घरी, सांगलीला परत यायचे असे नियोजन केले. परंतु, अचानक करोनाचे संकट सर्व जगभर पसरले. आपल्या भारतातही मग लॉकडाउन -1,  2,  3 असे करत लॉकडाउनची कालमर्यादा वाढतच गेली. तिकडे आंब्याचा हंगाम सुरु झाला. दरवर्षीचे घरच्या झाडाचे आंबे क्षणोक्षणी डोळ्यासमोर येऊ लागले. माझ्या 2-3 मित्रांना मी फोन केले. त्यांनी थोड्या थोड्या दिवसांनी, गेटवरुन चढून जाऊन, जमेल तसे आंबे काढून त्यांचा आस्वाद घेतला. काही मित्रांनी आंब्याचे लोणचे, चटणी, मुरांबा, साखरांबा असे अनेकविध पदार्थ केले आणि त्यांचे फोटो आम्हाला वॉटस्अप वर शेअर देखिल केले. आमचे घरी कुलुप असल्याने दरवर्षीची आंब्याची अढी यावर्षी नव्हती. आमच्या मित्रांनी काढलेले आंबे, आमच्या शेजाऱ्यांना, आमच्या नातेवाईकांना दिले. आंब्याची अप्रतिम चव व जिभेवर रेंगाळणाऱ्या अविट गोडीच्या रसभरीत वर्णनाचे फोनही आम्हाला आले.

करोनाची परिस्थिती थोडीशी आटोक्यात आल्यावर, कोव्हीड -19 स्पेशल ट्रेन सुरु झाल्यावर, सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करुन, जून अखेरीस, म्हणजे, तब्बल साडेतीन महिन्यांनंतर, आम्ही एकदाचे आमचे घरी, सांगलीला परतलो. एक दोन उन्हाळी व यावर्षी उशीरा सुरु झालेल्या  पावसामुळे अंगणातील फुलझाडे तरारली होती. जाई, जुई, मोगरा आदी फुलांच्या भरगच्च ताटव्यांनी व मंदधुंद सुगंधाने त्यांनी पहाटे आमचे गेटमध्येच स्वागत करून आमच्या प्रवासाचा शीण क्षणात घालवला.

थोडी विश्रांती घेतली. सकाळी उठल्यावर झाडांभोवतीचा पालापाचोळा गोळा केला,  नारळाच्या पडलेल्या झावळ्यांची आवराआवर केली. झाडांवर मायेने हात फिरवत, पाणी घातले. “घरचे चविष्ट आंबे यावर्षी आम्हाला चाखायला देऊ शकलो नाही” अशा अपराधी भावनेने आंब्याचे झाड, मान खाली घालून, जणू उदासवाणे आमचेकडे पहात असल्याचा भास झाला.

दरवर्षी पानापानात लपून बसणारे हिरवे, अर्धे पिवळसर आणि हळूवारपणे गडद पिवळे होणारे आंबे आठवले. दरवर्षीचे आंब्यानी लगडलेले झाडाचे मोबाइल मधील फोटो व आत्ता मात्र आंबेरहित झाडाचे काढलेले फोटो पाहताना मन हेलावून गेले.

गच्चीवरून आत्ता असेच काढलेले फोटो सहजच झूम करून पाहताना, पानाआड लपून बसलेला एक आंबा दिसला. अलगद हाताने त्याला खाली काढले आणि त्याचाही फोटो काढला.

फोटोत दिसणारा आंबा व आंब्याचे झाड याकडे पाहताना, आंब्याचे झाड आमच्याकडे पाहून गालातल्या गालात थोडे स्मित हास्य करत असल्याचा जणू भास झाला.

महाराज विशाळगडावर पोहोचेपर्यंत बाजीप्रभूने पावनखिंड जशी एका हाती लढवली तशीच आमच्या आंब्याच्या झाडाने आम्ही परगावातून परत येइपर्यंत, तो एकमेव आंबा, जवळजवळ साडेतीन महिने ऊन, वारा, पाऊस या सर्वांशी प्राणपणाने झुंज देऊन, इतर सर्वांपासून, पानात जणू लपवून ठेवला होता.

तेवढ्यात, वाऱ्याची एक झुळुक आल्याने, फांद्या हलवून, पानांच्या सळसळीने, आंब्याचे झाड, आमच्या पुनर्भेटीने, त्याला झालेला आनंदच जणू व्यक्त करीत असल्याचा साक्षात्कार आम्हाला झाला.

© श्री रवींद्र पां. कानिटकर

– श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ फुलपाखरू… ☆ सौ ज्योती विलास जोशी

☆ मनमंजुषेतून : फुलपाखरू… ☆ सौ ज्योती विलास जोशी

फुलपाखराचं  वेलींवर, फुलांवर बागडणं पाहणं हे नयन सुखकारक आहेच; पण त्याहीपेक्षा त्यांच्या पंखांवरची रंगांची पखरण न्याहाळण्यात मी जास्त रमून जाते.

लहानपणी फुलपाखरांच्या मागे धावून त्यांना पकडण्याचा माझा छंद आता मला खूप खटकतो.    कदाचित इतरांचे अनुकरण करण्याचा शिरस्ता मी मोडत नसेन इतकेच!

खूप छोटी छोटी झुंडीनं येणारी आणि डोळ्याचं पातं लवतं न लवतं तोच तोच दूर निघून जाणाऱ्या फुलपाखरांचं मला आकर्षण कधी नव्हतच. तेच जर एखादे मोठे फुलपाखरू फुलावर स्थिरावलं की मी हळूच बोटाच्या चिमटीत पकडत असेआणि बोटाच्या तळव्यावर उमटलेलं मीनाकाम तासन तास बघत बसे. फुलपाखरू केव्हाच स्वच्छंदी होऊन जायचं!!

काल सकाळी नेहमीप्रमाणे गणपती साठी जास्वंदीची फुले आणावीत म्हणून गच्चीवर गेले आणि माझं लक्ष वेधलं ते एका सुरेख अशा फुलपाखराने!! बऱ्याच दिवसानंतर फुलपाखरू दिसले आणि मी मोहरले.

जांभळा, पारवा,निळा, आकाशी,गडद निळा अशा निळ्या रंगांच्या विविध छटा आणि त्यात कोरलेली सुरेख नक्षी, तीही एक सारखी, दोन्ही पंखांवर मोजून मापून काढल्यासारखी जणू फ्रीहँड ड्रॉईंग! कमाल वाटली त्या विधात्याची!!

पिन ड्रॉप सायलेन्स म्हणतात ना इतकी निरव शांतता ठेवून मी पायरीवर स्थिरावले आणि फुलपाखराला न्याहाळू लागले मधु घटातील मध चोखता चोखता परागीभवनाचे काम नकळत सुरू होतं. जसं काही स्वार्था बरोबर परमार्थ!!!

उशीर झाला तसा मला खालून घरातून बोलावणे यायला सुरुवात झाली. मांजरीच्या पावलाने खाली उतरून “मी योगा करते आहे. मी ध्यान लावून बसले आहे. मला दहा मिनिटे त्रास देऊ नका.”अशी सर्वांना तंबी देऊन पुन्हा गच्चीवर आले.फुलपाखरू गोड हसत होतं…..

फुलपाखराला टेलीपथी झाली की काय? दहा मिनिटांनी ते उडून गेलं. ते पुन्हा येईल या आशेने तिथेच घुटमळले. पण व्यर्थ….

सकाळच्या कामाची लगबग सुरू होती.जास्वंद देवाला अर्पून मी स्वयंपाकाला लागले.अहो आश्चर्यम्! तेच फुलपाखरू माझ्या स्वयंपाक घरातील मनी प्लॅन्ट वर बसलेलं मला दिसलं.लगबगीने मी आरुषला म्हणजे माझ्या नातवाला बोलावून दाखवले. तोही बराच वेळ फुलपाखरू पाहण्यात रमला. नंतर ते सवयीप्रमाणे उडून गेले. पुन्हा दिसले म्हणून मीही भरून पावले.

दिवसभर त्याच्या निळ्या जांभळ्या पारव्या रंगाचा विचार घोळत होता. डोळ्यांनी तर ते रंग साठवूनच  घेतले होते. मिक्सिंगच्या टाक्याने अगदी डिट्टो फुलपाखरू विणायचा संकल्पही झाला मनोमन!..

संध्याकाळच्या चहासाठी स्वयंपाक घरात आले आणि एकदम दचकले! फुलपाखरू माझ्या हातावरच बसलेलं दिसलं मला. त्याचा अलवार स्पर्श जाणवला ही नाही. आरुष माझ्या पाशी उभा होता.त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि भीती अशा संमिश्र भावना होत्या.

जरासा हात हलला आणि ते उडून गच्चीच्या कठड्यावर जाऊन बसलं. डोळ्याची पापणीही न लवू देता आरुष एकटक त्याकडे बघत होता. माझ्यासारखाच तोही भावूक रात्री झोपेपर्यंत त्याच्या आणि माझ्यात फुलपाखरू सोडून कोणताही विषय नव्हता. आपल्या रंग पेटीतले सगळे निळे जांभळे रंग काढून तो फुलपाखरू आठवत होता.

माझ्यासारखाच फुलपाखरू चितारण्याचा संकल्प त्याने मनोमन केला असावा.

रात्री झोपतानाही आजी फुलपाखराची गोष्ट सांग असा हट्ट त्याने धरला.

“बाळा, मी तुला फुलपाखराचं छान गाणं म्हणून दाखवू का?”असे म्हणून मी ‘छान किती दिसते फुलपाखरू’ म्हणायला सुरुवात केली. ऐकता ऐकताच माझ्या पाखराच्या पापण्या मिटल्या……

सकाळी उठल्यावर मी गॅलरीचे दार उघडलं आणि खाली पडलेलं फुलपाखरू मला दिसलं. जवळचच कुणीतरी गेल्याच दुःख मला झालं. मी पटकन कुणी उठायच्या आत त्याची विल्हेवाट लावायचं पुण्यकर्म करून टाकलं.

मी विचार करू लागले की एरवी माणसांना घाबरणारा हा जीव आज माझ्या हातावर कसा काय येऊन बसला? मरणासन्न झालेलं ते माझ्या आश्रयाला आलं होतं. माझी मदत मागत होतं. मरण जवळ आलं आणि ते अगतिक झालं होतं. माझ्यावर इतका कसा त्याचा विश्वास? माझं मन त्याला उमगलं असेल का? माझ्या भावना त्याच्या पर्यंत पोहोचल्या असतील का? म्हणून तर त्याने इतक्या विश्वासाने माझ्या हाताचे चुंबन घेतलं असेल का? एक ना दोन हजार प्रश्नांचे काहूर माजले माझ्या मनात!

आरुष उठला, “आजी आज पण ते फुलपाखरू येईल ना ग?”

“हो,येईल ना! तू सगळं दूध पटापट पिऊन होमवर्क कम्प्लीट केलस तर येईल नक्की!!”

निरागस हा ही आणि निरागस ते ही…..

 

© सौ ज्योती विलास जोशी

इचलकरंजी

[email protected]

Mob.No. 9822553857

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ निरोप समारंभ ☆ सौ.अमृता देशपांडे

: निरोप समारंभ ☆ सौ.अमृता देशपांडे

ऑफिस मधला एक सहकारी रामानंद आज सेवानिवृत्त झाला. त्या निमित्ताने एक छोटासा कार्यक्रम आयोजित केला होता. कोणी ही  सेवानिवृत्त होतानाचा हा दिवस खूपच वेगळा असतो.  सकाळी 9 ते संध्याकाळी 6, दिवस भर एकत्र काम करणे, खाणे- जेवणे, एकमेकांवर रागावणे, रुसणे, एकमेकांची काळजी घेणे, आपलं काम

जितकंं चांगले करता येईल तितका प्रयत्न करणे.  या सर्वात इतकी वर्षे कशी गेली कळतच नाही. सेवानिवृत्त होणारी व्यक्ती उद्यापासून आपल्यात नसणार ही हुरहुर सर्वांना अस्वस्थ करते. निवृत्त होणार्या व्यक्तीच्या  मनात तर भावनांचे काहूर माजलेले असते. काळीज गलबलून गेलेले असते.  मनातलं  वादळ, गलबलणं, चेहर्यावर दिसत असतं. खूप ह्रदयस्पर्शी असतो तो दिवस.

रामानंदच्या निरोप समारंभाचा प्रसंग.  आज प्रास्ताविकापासून सगळं  वातावरण घरगुती स्वरूपाचं होतं. प्रेमळ आणि साधेपणाचं होतं.  आपण घरी जसे एकत्र जमून छोटंसं स्नेहपूर्ण संमेलन करतो, अगदी तसं…..कुठेच औपचारिकता नाही, कुणाचा ईगो नाही, सर्वच जण आपापली post ची शाल आपल्या जागेवर ठेऊन मनमोकळ्या स्वच्छ मनाने एकत्र जमले होते. मनाच्या कोपर्यात चलबिचल होती, रामानंद उद्या पासून ऑफिस मध्ये असणार नाही याची.

रामानंद मॅनेजिंग डायरेक्टर श्री भट सर यांच्या ऑफिस मध्ये attendant म्हणून काम करत होता. पर्सोनल खात्याच्या श्री बाल्लीकर सरांनी त्याच्या कामाची मोजक्या पण अर्थपूर्ण, यथोचित आणि नेमक्या शब्दात प्रशंसा केली.  ते काही वरवरचे शब्द नव्हते.  त्यातलं खरेपण आम्ही सर्वांनी अनुभवलेलं होतं. त्याचं पटपट चालणं, चटचट काम करणं, भराभर फाईल्स पोहोचवणं. कधीच  कामचुकारपणा नाही, वेळकाढूपणा नाही कि कंटाळा नाही.  चालण्या बोलण्यात, काम करण्यात ex- serviceman ची शिस्त आणि तत्परता होती. नेहमीच स्वच्छ, व्यवस्थित  inshirt केलेला पेहराव.  गबाळेपणाला थारा नाही. ना वागण्यात, ना बोलण्यात, ना कामात. आजही त्यानं घातलेला गुलाबी शर्ट त्याला छान शोभत होता. त्याच्याच सहकारी मित्रांनी त्याला आज प्रेमानं भेट दिला होता.

स्टेजवर होते फक्त दोघं. भटसर आणि रोज सकाळी आल्यावर चहा देणारा रामानंद. मला भट सरांचही कौतुक वाटलं आणि मनातला आदर दुणावला.

रामानंदला तुला काही बोलायचं आहे का असं विचारण्यात आले.  खूपदा निवृत्त होणारा नाही बोलत. मन असंख्य आठवणीनी आणि भावनांनी व्याकुळ झालेलं असतं. डोळ्यांच्या काठांवर थोपवलेलं पाणी कोणत्याही क्षणी  कोसळेल असं वाटत असतं. पण रामानंदनं सुखद धक्काच दिला. तो बोलायला उभा राहिला.  …….” MD साहेबा, सब बडे साहेबा, और मित्रों…. हे शब्द मनाला स्पर्शून गेले. पहिल्यांदाच त्याचं इतकं सलग बोलणं ऐकलं. एरव्ही कामाशिवाय तो जास्त बोलत नसे. त्याच्या शब्दातून, भावना व्यक्त करण्याच्या शैलीवर भारतीय सैन्य दलातील हिंदीचा प्रभाव थक्क करणारा होता. अतिशय सहज, सोप्या भाषेत त्याने मनातले भाव व्यक्त केले. मनाच्या गाभार्यातून आलेल्या ह्रदयस्पर्शी भावना साध्या शब्दातूनही किती सुंदर परिणाम साधतात, हे सर्वांनी कडकडून वाजवलेल्या टाळ्यांनी सिद्ध केले.

सैन्य दलातून निवृत्ती घेऊन तो 18 वर्षांपूर्वी EDC त आला. आज तो याही सेवेतून मुक्त झाला.  मुलं अजून शिकत होती.  आर्थिक परिस्थिती पण जेमतेमच.  पण कुठेच त्रासिक पणा नाही, रड नाही, ” आणि दोन वर्षे वाढवून द्या, एक तरी  द्या……” अशी भीक नाही मागितली. शांत, समाधानी, नम्र स्वभाव. उद्यापासून काय करायचं ते आधीच ठेवलेलं. वयाची साठी आली तरी आरोग्य ठणठणीत कसं ठेवायचं ते त्याच्याकडून शिकावं.

Healthy mind stays in healthy body. समाधानी वृत्तीच चांगल्या आरोग्याची गुरुकिल्ली असते. कामचुकारपणा? लबाडी, अति हव्यास, हेवेदावे, मत्सर, खरेपणाचा अभाव अशा वृत्तींमुळे आपण सुखाला मुकतो आणि आनंदाला पारखे होतो.

रामानंदची समाधानी वृत्ती, सतत  कार्यरत रहाण्याची धडपड, आणि साधेपणा खूपकाही शिकवून गेला. आभार मानताना त्यानं हिंदीतून व्यक्त केलेलं अस्खलित आणि ओघवतं मनोगत खूपच भावलं.

इतकी वर्षे आपल्या बरोबर असणार्या सहकारी मित्राची नवी ओळख सर्वांचंच मन हेलावून गेली. वयाच्या 18 व्या वर्षी भारतीय सैन्य दलात सामील होऊन 40 व्या वर्षापर्यंत तेथील कडक शिस्तीचे, कठोर परिश्रमांची नोकरी संपवून घरी आला. Ex serviceman म्हणून आमच्या ऑफिस मध्ये आला.  आता 58 व्या वर्षी निवृत्त झाला. आता तो त्यांच्या घराण्याचा पारंपारिक व्यवसाय आनंदाने करतो. मासे गरवण्याचा. म्हणजे गळ टाकून मासे पकडणे.

आधी देशसेवा, नंतर राज्यसेवा, आता पारंपरिक व्यवसाय.  सर्वार्थाने आयुष्यातली परिपूर्ती हीच आहे ना!

 

© सौ.अमृता देशपांडे

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मातृमंदिर ☆ सौ पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

सौ पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

शिक्षण- B.A B.Com शालेय शिक्षण ज्युबिली कन्या शाळा मिरज, महाविद्यालयीन शिक्षण विलिंग्डन महाविद्यालय

छंद- वाचन, लिखाण, शिवण मैदानी खेळात (खोखो, कबड्डी, ऍथलेटिक्‍स, अनेक बक्षिसे एक वर्ष विलिंग्डन जिमखाना विद्यार्थिनी प्रतिनिधी म्हणून निवड)

पुरस्कार- १) कौशिक प्रकाशन सातारा २) मराठी विज्ञान परिषद इस्लामपूर  ३) ज्येष्ठ नागरिक संघ हुपरी ४) रामकृष्ण मिशन

आणखी बरेच लहान-मोठे निबंधातील पुरस्कार (सकाळच्या मुक्तपीठ स्मार्ट सोबती मध्ये आलेले लेख, राष्ट्रसेविका समितीच्या हस्तलिखितासाठी गेली पाच वर्षे लेखकांची निवड, नवरत्न नाथ नगरी दिवाळी अंकांमधून आलेले लेख)

☆ मनमंजुषेतून : मातृमंदिर ☆ सौ पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

आम्ही शेतात रहात असल्यामुळे साप, विंचू, चोर यांच्यापासून रक्षण होण्यासाठी कुत्र्याची गरज होती. योगायोगाने सुंदर ठुसक्या बांधण्याची, पिवळे ठिपके असलेली कुत्री कुठून तरी अचानक आली आणि आमची होऊन राहिली. नामकरण झालं पिंकी. टॉमी कुत्रा आणि पिंकी परिसराचे राखण छान करायचे. आमच्या लहान मुलांवर त्यांचे विलक्षण प्रेम होते आणि आणि ते दोघे मिळवून मुलांना छान सांभाळायचे. आता पिंकी छान रुळली होती. आता तिला पहिल्यांदाच पिल्लं होणार म्हणून तिची बडदास्त चालली होती. लवकरच तिला दहा पिल्ल झाली. अगदी गोंडस पिल! त्यांच्यासाठी एक छोटसं घर तयार केलं. बाळंतिणीची व्यवस्थाही छान चालली होती. पिंकी  बाहेरून आली की पिल्ले धावत जाऊन पिण्यासाठी तिला झुंबा याची. एक दिवस अचानक पिंकी गायब झाली. खूप शोध घेतला, पण नाही कुठेच नाही. पिल्लांना आम्ही खाऊ घालून वाढवत होतो. एके दिवशी अचानक दुपारी एका कुत्र्याचा आक्रोश ऐकायला आला. पिंकीचा होता तो आक्रोश. पोट खपाटीला अंगावर गोमाशा, गळ्यात नायलॉन च्या कुरतडून तोडलेल्या दोरीचा थोटुक अशी अवस्था पाहिली आणि खात्री पटली की तिला कोणीतरी पळवून नेल होत. दुरून आल्याने ती धापा टाकीत होती. पिलांच्या जवळ जात होती. पिल तोपर्यंत आईला विसरली होती. तिचा रागरंग बघून पिल्ल दूर जायला लागली. रात्री बाळासाठी कडा उतरून येणारी हिरकणी मला आठवली. आम्ही पिंकीला खायला देत होतो, जवळ घेत होतो. पण तिला फक्त पिल जवळ हवी होती. मी एक आई असल्याने मला कल्पना सुचली. दोन  पिलांना उचलून तिच्या पोटाजवळ नेल आणि (अहो आश्चर्यम्) पिलानी आईला ओळखलं. माया, वात्सल्य, प्रेम, करुणा, अत्यानंद सगळ्या भावना ओसंडून वहायला लागल्या. बिन दुधाची कोरडीच, पण सगळ्या भावनांनी तट्ट भरलेली आचळ पिल्ल चुकू चुकू ओढायला लागली. मोकळ्या पोटी प्रेमाचा पान्हा फुटला होता. आता पुन्हा ती पिलां बरोबर आपल्या घरात रहायला लागली. पिल्ल मोठी झाली. त्यांचा सर्वांना जीव लागला होता. चांगलं घर बघून, त्यांना ओवाळून, ‘नीट सांभाळा हो’ असो सांगून हळूहळू दिली गेली. प्रत्येक पिल्लू देताना डोळ्यात पाणी उभ रहायचं पण कुठंतरी भावनांवर नियंत्रण ठेवायला हवच ना! मातृ मंदिरात पिंकी एकटीच राहिली. दिवस रहात नाहीत.

आता टॉमी आणि पिंकी दोघेही म्हातारे झाले. टॉमी कॅन्सर होऊन देवाघरी गेला. दोघांनीही आमच्यावर अनंत उपकार केले आहेत. न फिटणारे. आता पिंकीचे ही खाणेपिणे कमी झाले. तिला डोळ्याला ही कमी दिसायला लागले. तिचे हाल होऊ नयेत, अशी आम्ही रोज प्रार्थना करीत होतो. दिवाळीचा आनंद सर्वांना मिळवून दिलान. दिवाळीतला लाडू खाल्लान. आणि दुसरे दिवशी सकाळी शांत पणाने प्राण सोडलान.

मातृमंदिर ओसाड झालं. मोकळं झालं. तेथेच तिची उत्तरक्रिया करून वर चाफ्या च झाड लावलं आणि त्या झाडावर पाटी लावली “मातृमंदिर”

 

© सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

पत्ता- ‘पुष्पानंद’ बुधगावकर मळा रस्ता मिरज, जि. सांगली

फो नं. ०२३३-२२१२१५१ मो. ९४०३५७०९८७

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ सुवर्णक्षण- मोदी भेटीचा ☆ सौ.अस्मिता इनामदार.

सौ. अस्मिता इनामदार

परिचय

जन्मतारीख – १३/१२/१९४५

शिक्षण – बी.ए. डी.सी.ओ.एस्

साहित्यिक कारकीर्द 

दोन काव्यसंग्रह – कविता अंतरीच्या काव्यसंग्रह, शब्दुली चारोळीसंग्रह

दैनिके व मासिकांमधून कवितांना प्रसिद्धी, नवतरंग प्रातिनिधिक काव्यसंग्रहात कवितेचा समावेश

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात निमंत्रित कवयित्री म्हणून सहभाग. ( सातारा , सांगली , पुणे , कराड , इंदौर , डोंबिवली )

अखिल भारतीय महिला कवयित्री परिषद , दिल्ली  ह्या संस्थेचे सन्माननीय सभासदत्त्व, संस्कारभारती , सांगली साहित्यविभाग प्रमुख, स्पर्धा परीक्षक म्हणून नेमणूक, कवि विचारमंच, शेगाव कडून साहित्यातील योग

सांगली / कोल्हापूर आकाशवाणीवर काव्यवाचन

आरोग्य संवेदना , सांगली कार्यकारिणीत कार्यरत, महात्मा गांधी ग्रंथालय कार्यवाह

सम्मान / पुरस्कार –  शहाबाई यादव साहित्य गौरव पुरस्कार, इतिहास संशोधन मंडळ , संगमनेर उल्लेखनीय काव्य पुरस्कार, प्रतिष्ठा प्रतिष्ठान , सांगली साहित्य पुरस्कार,  सरोजिनी नायडू पुरस्कार दिल्ली येथे कविता अंतरीच्या पुस्तकाला, कै.सुरेश कुलकर्णी पुरस्कार – सुधांशू , औदुंबर, अनेक काव्यस्पर्धेत पुरस्कार, कल्पना फिल्म असो. कला मंच , मिरज – सन्मानपत्र, श्री समर्थ साहित्य , कला , क्रिडा व सांस्कृतिक युवा मंडळ , पलूस कडून कविता अंतरीच्या पुस्तकास पुरस्कार,  बिझनेस एक्सप्रेस, सांगली काव्यस्पर्धेत उत्तेजनार्थ, रंगत संगत प्रतिष्ठान , पुणे – सन्मानपत्र, साहित्य प्रेमी मंडळ  सोमेश्वरनगर , बारामती विशेष पुरस्कार, जिल्हा ग्रंथालय आयोजित ग्रंथोत्सवात उत्कृष्ट वाचक प्रमाणपत्र, आदर्श कार्यकर्ती संस्कारभारतीचा पुरस्कार,दानाबद्दल शब्दभारती पुरस्कार, ऑनलाईन स्पर्धांमधून ९४ प्रमाणपत्रे

 

☆ मनमंजुषेतून: सुवर्णक्षण- मोदी भेटीचा ☆ सौ.अस्मिता इनामदार 

‘अजी सोनियाचा दिनु। वरुषे अमृताचा घनु।‘ म्हणावं, असा आनंदयोग एक दिवस माझ्याही आयुष्यात आला. त्या दिवशी पाडगावकरांच्या सुप्रसिद्ध गीतात एक-दोन शब्दांचा बादल करत मला म्हणावसं वाटलं, ‘तिन्ही लोक आनंदाने भरून जाऊ दे. तुझे गुण गाण्यासाठी शब्द लाभू दे.’ ‘तुझे’ म्हणजे, कै. लक्ष्मणराव इनामदार यांचे आणि तो सोनियाचा दिनु होता, 21 सप्टेंबर 2017. तो दिवस होता, कै. लक्ष्मणराव इनामदार यांच्या जन्मशताब्दीचा. हा सोहळा साजरा झाला, तो दिलीतील विज्ञानभवन येथे आणि निमंत्रक होते. भारताचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी.

कै. लक्ष्मणराव इनामदार हे माझे चुलत सासरे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे ते गुरू. ते वकील होते. ते मुळचे महाराष्ट्रातले असले, तरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यासाठी, संघप्रचारक म्हणून गुजराथमध्ये गेले आणि तिथेच स्थायिक झाले. ते ब्रम्हचारी होते. गुजराथमधील भ्रमंतीतच त्यांची आणि मोदीजींची भेट झाली. त्यांच्या कार्याचा प्रभाव मा. मोदीजींवर पडून ते संघाकडे ओढले गेले. लक्ष्मणरावांना त्यांनी आपले गुरू मानले. ‘आयुष्यात मी जो काही घडलो, ते केवळ वकीलसाहेबांमुळेच (लक्ष्मणरावांमुळेच),‘ असे उद्गार त्या समारंभात मोदीजींनी काढले आणि आम्हाला धन्य धन्य वाटले. समाजातील आर्थिक दुर्बलता दूर करण्यासाठी लक्ष्मणरावांनी ’सहकार भारती’ या चळवळीचा पाया घातला. ‘विना संस्कार नही सहकार’ हे त्या चळवळीचे बोधवाक्य होते. हा मंत्र मोदीजी आजही आचरणात आणतात.

21 सप्टेंबर 1917 हा लक्ष्मणरावांचा जन्म दिवस. 2017 ला या दिवशी त्यांचा जन्मशताब्दीचा सोहळा साजरा करावा, असे मोदीजींच्या मनात आले. त्याची रूपरेखा आखताना, लक्ष्मणरावांच्या परिवारातील मंडळींनाही त्यात सामील करून घ्यायला हवे, असे मोदीजींना वाटले. त्या दृष्टीने त्यांनी आखणी करायला सुरुवात केली. लक्ष्मणरावांच्या परिवारातील व्यक्तींचा शोध घेतला गेला. प्रत्येकाला स्वतंत्रपणे आमंत्रणे पाठवली. सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आग्रहपूर्वक निमंत्रणे दिली गेली. त्याप्रमाणे आम्ही 20-22 जण 21 सप्टेंबर २०17 रोजी बरोबर दहा वाजता दिल्लीयेथील विज्ञानभवनावर हजार झालो. दारावर कडेकोट सुरक्षा व्यवस्था होती.  सभागृहातील २-३ रांगा खास आमच्यासाठी राखीव ठेवलेल्या होत्या. आमचे स्वागत करून मोठ्या सन्मानाने आम्हाला आमच्या जागी बसवले गेले. खुर्च्यांवर आमच्या नावाच्या पट्ट्या लावलेल्या होत्या. बरोबर ११ वाजता पंतप्रधान सभास्थानी आले. सुरूवातीला लक्ष्मणरावांच्या तैलचित्राचे अनावरण झाले. त्यावर गुलाबाच्या पाकळ्या उधळल्या गेल्या. मा. मोदीजींनी आपल्या भाषणात त्यांच्या कार्याचा थोडक्यात आढावा घेतला.  दोन वाजता उपस्थितांचे भोजन झाल्यावर समारंभाची सांगता झाली.

आम्हा इनामदार परिवारातील सर्वांना मोदीजींनी संध्याकाळी चार ते पाच यावेळात भेटायला बोलावले. आम्ही सर्वजण बरोबर चार वाजता जनपथावरेल त्यांच्या निवासस्थानी पोचलो. एका हॉलमध्ये आमच्या भेटीची व्यवस्था केली होती. तिथे त्यांनी आम्हा प्रत्येकाची स्वतंत्रपणे ओळख करून घेतली. कोण कोण कुठे असतं, काय काय करतं, प्रत्येकाचे लक्ष्मणरावांशी काय नाते आहे, याची चौकशी केली. या प्रसंगी त्यांनी लक्ष्मणरावांच्या अनेक आठवणी सांगितल्या. आम्ही दिलेल्या भेटी त्यांनी स्वीकारल्या. यावेळे मला त्यांना अगदी जवळून पाहता आलं. पाच मिनिटे त्यांच्याशी बोलता आलं. त्यांना हार घालून त्यांच्याबद्दलची भावना विकत करता आली. त्यांचं ऋजु व्यक्तिमत्व, सर्वसामान्यांशी समरसून बोलणं, त्यांचा शालीन, हवाहवासा वाटणारा सर्वत्र सहज वावर यामुळे मी अगदी भारावून गेले. माझ्यासाठी त्यावेळी जसा ‘अमृताचा घनु बरसला’ आणि तो ‘सोनियाचा दिनु झाला.

त्यावेळी आमच्या इनामदार परिवारासोबत त्यांचा फोटो काढला.  आजही तो फोटो पाहताना ते आंनंदक्षण माझ्यापुढे साजिवंत होतात.

© सौ अस्मिता इनामदार

पत्ता – युनिटी हाईटस, फ्लॅट नं १०२, हळदभवन जवळ,  वखारभाग, सांगली – ४१६ ४१६

मोबा. – 9764773842

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares
image_print