मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ कलाकार… ☆ श्री सुनील शिरवाडकर ☆

श्री सुनील शिरवाडकर

??

☆ कलाकार… ☆ श्री सुनील शिरवाडकर

लहानपणीची गोष्ट.घरच्यांसोबत दर गुरुवारी दत्ताच्या देवळात जाणं व्हायचं.मंदिराच्या बाहेर प्रशस्त फुटपाथ होता.त्या फुटपाथवर एक दत्ताचं चित्र काढलेलं असायचं. रंगीत खडुंनी रंगवलेल्या त्या चित्रावर असंख्य नोटा.. नाणी असायच्या. आणि त्यांची राखण करत एक काळासावळा मुलगा बसलेला असायचा. प्रत्येक गुरुवारी चित्र असायचं दत्ताचचं.. पण त्यातील रंगसंगती बदललेली असायची. त्यामुळे नेहमी ते नवीनच वाटायचं.

मला एक खुप उत्सुकता होती. ते चित्र काढताना बघायची.मग एकदा मी सकाळी लवकरच त्या मंदिरात गेलो.बाहेर फुटपाथवर तोच तो काळा सावळा मुलगा उभा होता. शर्टची बटणं काढत होता. त्याने शर्ट काढला. तो हातात धरला.. आणि फुटपाथ झटकायला सुरुवात केली. त्याच्या द्रुष्टीने फुटपाथ एकदम क्लीन झाला.. मग जवळच्या पिशवीतुन त्यानं कोळसा काढला.

त्या कोळश्यानं त्यानं एक चौकोनी आऊटलाईन काढली.. चित्राच्या आकाराची.मग निरनिराळ्या रंगांचे खडू घेऊन त्यांचं चित्र काढणं सुरु झालं.कधी कुठं चुकलं की सरळ त्या भागावर थुंकायचा… आणि तो भाग दुरुस्त करायचा.त्याबद्दल त्याला काहीच वाटायचं नाही.

चित्र काढुन झाल्यावर त्यानं खिशातुन काही नोटा काढल्या.त्या दत्ताच्या चित्रावर ठेवल्या.काही नाणी विखरुन ठेवली.त्याच्या द्रुष्टीने सगळं चित्र पुर्ण झालं होतं.आता तो दिवसभर त्या चित्राशेजारी बसुन लोकांची वाट पहाणार होता.

नंतर मला त्या चित्रकार मुलाबद्दल बरीच माहिती मिळाली.दत्तु त्यांचं नाव.तो जसा गुरुवारी दत्ताचं चित्र काढतो..तसाच शुक्रवारी देवीच्या मंदिरासमोर देवीचं चित्र काढतो.. सोमवारी शंकराच्या मंदिराबाहेर चित्र काढतो.त्याचा बापही पुर्वी मंदिराबाहेर बसायचा.देवादिकांची चित्रे.. पुस्तके विकायचा.लहानगा दत्तु बापाजवळ बसलेला असायचा.मग बाप त्याला वेगवेगळ्या गोष्टी सांगे.एकदा कधीतरी पुस्तकात बघून दत्तुनं चित्र काढलं..तिथेच.. रस्त्यावर.एवढ्याश्या मुलानं काढलेलं ते चित्र बघुन चार लोकांनी त्यावर पैसे टाकले.आणि मग त्याला तो नादच लागला.

कुठलंही कलेचं शिक्षण न घेतलेले हे कलाकार.त्यांच्यात उपजतच हा एक सुप्त गुण असतो.कितीतरी कलाकार असतात असे.अगदी डोंबाऱ्याचे खेळ करणारे पहा.उंचावर दोरी बांधलेली असते.त्यावरुन तोल सावरत जाणं सोपं तर नक्कीच नसतं.हातात आडव्या धरलेल्या काठीने ते शरीराचा तोल सावरत जीवघेणा खेळ करत असतात.

काही जणांकडे एक अगदी छोटी लोखंडी रिंग असते.एका बाजुने त्यात घुसायचे.. आणि दुसर्या बाजुनं बाहेर यायचं.शरीराचं अगदी छोटं मुटकुळं करुन हा खेळ करताना किती कसरत करावी लागत असेल.

रस्त्यावर गाणी म्हणत फिरणारा वासुदेव हाही खरंतर कलावंतच.मी एकदा अश्याच एका वासुदेवाला तयार होताना पाहिलंय.पहाटे साडेचार वाजताच तो उठला होता. स्नान करुन शुचिर्भूत झाला. अगदी छोटंसं घर होतं त्याचं.लाकडी फडताळातुन त्यानं अंगरखा काढला.हा अंगरखा म्हणजे एक बाराबंदीच होती. धोतर नेसलेलं होतंच. त्यावर तो बाराबंदीच सारखा अंगरखा चढवला.एका बाजुला असलेल्या नाड्या खेचुन तो घट्ट बांधला.

एका पिशवीतुन काही माळा काढल्या. त्यात कवड्यांची माळ होती.. एक मोठ्या टपोर्या मोत्यांची माळ होती.. पिवळ्या मण्यांचे सर होते. ते परिधान केले. मग मेकअप. कपाटातुन काढलेल्या झोळीत एक छोटा आरसा होता. त्यात बघुन वासुदेवानं कपाळावर सुरेख गंध रेखलं. त्या उभ्या गंधाच्या मधोमध बुक्क्याचा टिळा काढला. हातात चिपळ्या घेतल्या.. आणि दान पावलं..दान पावलं..म्हणत पहाटेच्या सुमारास बाहेर पडला.

बहुरुपी हाही कलावंतच.पूर्णपणे पोलिसाच्या गणवेशात तो दुकानात येऊन उभा रहायचा.दारात पोलिस आल्यावर जरा दचकायला व्हायचे.त्याच्या हातात वही पेन.

“चला निघा दुकानातुन.. तुमच्या नावाचं वॉरंट आणलंय”

असं एकदम दरडावून बोलायचं.सुरुवातीला खरंच घाबरून जायचो.. हे काय आपल्यामगे लागलंय म्हणून भीती वाटायची. पण मग लक्षात यायचं.. अरे हा तर बहुरुपी. जराशी हुज्जत घालुन दहा वीस रुपये मग त्याला द्यायचो.

आणि तो त्याचा अधिकार असायचा.. असं आत्ता वाटतं.हातावर पोट असणारी ही माणसं.वर्षातले आठ महिने शेती करणं..ती नसेल तर कोणाच्या तरी शेतावर राबणं.. अगदी काहीच नाही तर बिगारी काम करणं. आणि हे करत आपली कला दाखवत चार पैसे मागणं हेच यांचं आयुष्य.

याचना करणे म्हणजे भीक मागणे. देवळाबाहेर बसुन.. हात पसरुन जे मिळेल त्यात भागवणारे वेगळे. त्यांना भिकारी म्हणणं एकवेळ ठीक.. पण हे भिकारी नसतात. ते लोकांपुढे हात पसरतात..पण त्याआधी ते आपली कोणती तरी कला सादर करतात. म्हणुनच ते असतात.. ‘ कलाकार.’ 

© श्री सुनील शिरवाडकर

मो.९४२३९६८३०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “दृष्टिकोन” शिकायचा मात्र राहूनच गेला… ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ दृष्टिकोन” शिकायचा मात्र राहूनच गेला… ☆ डॉ अभिजीत सोनवणे

बघता बघता अख्खा मार्च महिना सुद्धा संपला की राव … ! 

मला आठवतं… लहानपणी मार्च महिना म्हणजे एकतर परीक्षा किंवा पुढील महिन्यातील परीक्षेचे टेन्शन….! 

डॉक्टर झाल्यानंतर असं वाटलं…. चला परीक्षांचे टेन्शन कायमचं संपलं…. 

पण खऱ्या परीक्षा तिथूनच पुढे सुरू झाल्या… त्या आजपर्यंत सुरूच आहेत…. ! 

एकूण काय ? आयुष्यातल्या परीक्षा कधीच संपत नाहीत…! 

पूर्वी मला वाटायचं, परीक्षेत जास्त “मार्क” पाडले म्हणजे मी जिंकलो…. 

खरंतर दर दिवशी… दरवर्षी तुमच्यातले “गुण” किती वाढले हे जास्त महत्त्वाचं असतं, मार्क हा फक्त आकडा असतो…. पण दुर्दैवाने चार भिंतीतली शाळा आम्हाला ते शिकवू शकली नाही… !

मला आठवून सांगा, आज पर्यंत तुम्हाला आठवी, नववी, दहावी, अकरावी, बारावीचे मार्क कोणी विचारलेत… ? मी छातीठोकपणे सांगतो; तुम्हाला आजपर्यंत ते कोणीही विचारलेले नाहीत…!

आपण काटकोन -त्रिकोण -लघुकोन -चौकोन सर्व कोन शिकलो …. एक “दृष्टिकोन” शिकायचा मात्र राहूनच गेला…!!! खरं आहे ना ??? 

माकडापासून आपण माणूस झालो…..! .. खरंच झालो का …. ??? हा वादाचा विषय आहे…! 

साइन कॉस थिटा बीटा…. अल्फा गॅमा लॉगरिदम…  यात मला कधीही रस नव्हता… जन्मल्यापासून ते आत्तापर्यंत मला या गोष्टीचा काहीही उपयोग झाला नाही…! इंजिनीयरिंगला या बाबी कदाचित उपयोगी असतील…! 

मला मात्र लहानपणापासून कायम हृदयाची धप धप आवडायची…. आमच्या मेडिकलच्या भाषेत याला Lub Dub असं म्हणतात…. ! .. नाव काहीही द्या हो…. शेवटी जगवते ती हृदयातली धडधड …! 

यानिमित्तानं एक प्रसंग आठवला…

लहानपणी शाळेत त्यावेळी, डब्यात वयानुसार एक पोळी आणि भाजी सोबत लोणचं असणं, हि आमची श्रीमंती होती… दिवसा शाळा आणि रात्री एसटी स्टँडवर हमाली काम करणारा आमच्यासोबत त्यावेळी शाळेत एक मुलगा होता… खिशात तो त्यावेळी एक गुळाचा खडा आणायचा… आम्ही मिटक्या मारत; पोळी भाजी लोणचं खात असताना तो आमच्याकडे बघत, हसत गुळाचा खडा चघळायचा आणि शाळेतल्या नळाशी, ओंजळ धरून घुटुक  घुटुक पाणी प्यायचा… वरून मस्त हसायचा…! 

… पण ते हसू कारुण्यपूर्ण होतं हे आज कळतंय…आम्ही वॉटर बॅग मधून पाणी प्यायचो….उपाशी राहून तो तृप्त होता…. पोटभर खाऊन आम्ही मात्र अतृप्त होतो…. ! 

का नाही मी कधीच बोलावलं त्याला माझी भाजी पोळी खायला… ? 

का नाही काढून घेतला मी तेव्हा त्याच्याकडून गुळाचा तो खडा…. ? 

माझा डबा त्यावेळी त्याला खायला देऊन, माझी वॉटर बॅग त्याच्यापुढे धरून, त्याच्या खिशातला गुळाचा खडा काढून, चघळत चघळत शाळेतल्या नळाला ओंजळ धरून मी सुद्धा घुटुक  घुटुक पाणी प्यायलो असतो एखाद वेळी तर ??? … तर… मी सुद्धा माणूस झालो असतो…!!

पोटार्थी मी…. एक चपाती, थोडी भाजी आणि नखभर लोणचं माझ्याकडून सोडवलं गेलं नाही तेव्हा…. 

मात्र गुळाचा तो खडा मी हरवून बसलो कायमचा … !!! 

कारण…. कारण , “गाढवाला गुळाची चव काय”… ? 

मराठीत हा वाक्प्रचार सुद्धा माझ्याच मुळे रूढ झाला असावा…. आता कुठेही गुळ बघितला, की मला त्याचं ते कारूण्यपूर्ण हसू डोळ्यासमोर येतं… आणि मग गुळ पाहून सुद्धा माझा चेहरा कडवट होतो…! 

आज तो कुठे असेल … ? असेल तरी का ???

तो नक्कीच असेल; आणि कुठेतरी चमकतच असेल, कारण आयुष्यामध्ये असे संघर्ष करणारेच नेहमी यशस्वी होतात…!  तो जिंकला नसेलही कदाचित, परंतु यशस्वी मात्र नक्की असेल…

जिंकणं आणि यशस्वी असणं यात फरक आहे… ! जिंकलेला प्रत्येक जण यशस्वी असतो असं नाही….  परंतु यशस्वी असलेला प्रत्येक जण जिंकलेला असतो….! 

जिंकणं म्हणजे शर्यतीत दरवेळी पहिलं येणं नव्हे ….  शर्यतीत धावताना, वाटेत आलेल्या काट्याकुट्या दगड धोंड्यांना तुडवत त्यांना पार करणं… धावताना छाती फुटायची वेळ येते, त्यावेळी स्वतःला सावरत, आपल्या सोबत पळणाऱ्याला धीर देणं म्हणजे शर्यत जिंकणं….!  यावेळी तो जिंकेल न जिंकेल…. परंतु तो यशस्वी असतो…. हे कोणत्याही शाळा कॉलेजात शिकवत नाहीत….!!! 

आपल्या सोबत धावणारा एखादा प्रतिस्पर्धी पायात पाय अडकून पडला, तर त्याला उठवून पुन्हा धावायला प्रवृत्त करणं,  म्हणजे शर्यत जिंकणं…. यावेळीही तो जिंकेल न जिंकेल…. परंतु तो यशस्वी असतो…. हे पण कोणत्याही शाळा कॉलेजात शिकवत नाहीत….!!! 

नाती जोडता जोडता नेमकं कुठं हरायचं ते कळणं, म्हणजे शर्यत जिंकणं…

यावेळी तो जिंकेल न जिंकेल…. परंतु तो यशस्वी असतो…. हे सुद्धा कोणत्याही शाळा कॉलेजात शिकवत नाहीत….!!! 

पडणं म्हणजे हरणं नव्हे…. पडल्यानंतर उठून उभंच न राहणं म्हणजे हरणं, हे समजणं….म्हणजे शर्यत जिंकणं….! … दुर्दैवानं…. हे सुद्धा कोणत्याही शाळा कॉलेजात शिकवत नाहीत….!!! 

असो, विषय लांबत जाईल… मुळ मुद्द्यावर येतो…. 

तर, अशाच पडणाऱ्या आणि पडून उठणाऱ्या अनेक लोकांना कोणत्या ना कोणत्या माध्यमातून, आपण सर्वांनी मदत केली आहे…. आणि म्हणूनच, मार्च महिन्यातील हा गोषवारा …. आपणासमोर सविनय सादर… ! 

*(आमच्या कामाचा मूळ गाभा फक्त वैद्यकीय सेवा देणे नसून, वैद्यकीय सेवा देता देता, त्यांचा विश्वास संपादन करणे, त्यांच्याशी चांगले नाते निर्माण करणे, भिक मागण्याची कारणे शोधणे, त्यांच्यामधील गुणदोष शोधून त्यांना व्यवसाय करण्यास प्रवृत्त करणे आणि त्यांना झेपेल तो व्यवसाय टाकून देणे…. जेणेकरून ते भिक्षेकरी म्हणून नाही, तर कष्ट करायला लागून, गावकरी होऊन ते सन्मानाने जगतील… कुणीही कुणापुढे हात पसरून लाचार होऊ नये, जगात कोणीही भिकारी असू नये, हा आमच्या कामाचा मूळ गाभा आहे, वैद्यकीय सेवा देणे हा त्यांच्या हृदयापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही फक्त मार्ग म्हणून निवडला आहे)*

भिक्षेकरी ते कष्टकरी आणि कष्टकरी ते गावकरी

– श्री बाकले सर यांनी शेकडो नवीन शर्ट (पॅकिंग आणि प्राईस टॅग सुद्धा न काढलेले) आम्हाला दिले. 

हे सर्व शर्ट आम्ही 6 अपंग लोकांना विक्रीसाठी दिले.       “आयुष्यात अंधार असेलही; परंतु मनातला प्रकाश विझलेला नाही, आम्हाला भीक नको, आमच्याकडून वस्तू विकत घ्या” अशा आशयाची पाटी, व्यवसाय करताना त्यांच्या जवळ दिसेल अशा पद्धतीने ठेवली आहे…. एक रुपया …. दोन रुपये भिक द्या हो…. म्हणून लाचार होणारे हे लोक, आज दर दिवशी कमीत कमी 800 ते 1000 रुपयांचा व्यवसाय करत आहेत…! आज ते भिक्षेकरी नाहीत, कष्टकरी झाले आहेत…! 

एका महिन्यात 6 दिव्यांग लोक स्वतःच्या पायावर उभे राहिले याचे सर्व श्रेय मी समाजाला देतो. 

मला जर कोणी पाच मूठ गहू दिले, तर मी ते तसेच कोणाला वाटणार नाही … 

मी गहु जमिनीत रुजवेन, खत पाणी घालेन आणि मग जेव्हा पाच पोती धान्य होईल, तेव्हा ते माझ्या लोकांना मी विकायला लावून व्यवसाय करायला लावेन… यातल्या पाच मुठी पुन्हा बाजूला काढून त्यांनाही त्या जमिनीत पेरायला लावेन…! 

आपण अशा पाच मुठी नाही…. हजारो मुठी आम्हाला दिल्या आहेत आणि म्हणूनच आम्ही आपल्यासमोर नतमस्तक आहोत… ! 

वैद्यकीय सेवा, अन्नपूर्णा प्रकल्प, खराटा पलटण  हे सर्व इतर उपक्रमही नियमितपणे सुरु आहेत. 

शैक्षणिक

भीक मागणाऱ्या पालकांच्या अनेक मुलांना आपण दत्तक घेतलं आहे. हे सर्व खर्च आता माझ्या अंगावर साधारण मे महिना अखेर किंवा जून महिन्याच्या सुरुवातीला पडतील. 

माझ्या वैयक्तिक आयुष्यावर आणि आलेल्या अनुभवांवर आधारित जे पुस्तक लिहिले आहे, त्याच्या विक्रीच्या पैशातून या सर्व मुलांचा खर्च भागवण्याचा प्रयत्न करत आहे. 

माझं पुस्तक आपण विकत घेत आहात… पुस्तक आवडो न आवडो माझं कौतुक करत आहात… मुलगा म्हणून स्वीकारून; आई बापाच्या प्रेमळ नजरेने पाठीवर हात ठेवत आहात… आपण माझ्या सोबत आहात याचा काही वेळा मलाच माझा हेवा वाटतो…!

आपल्या एका मुलीला कलेक्टर व्हायचे आहे, तिची स्वप्नं खूप मोठी आहेत…. काही वेळा बाप म्हणून मी हतबल होऊन जातो… पण तुम्ही सोबत आहात; याची आठवण झाली की मी पुन्हा निर्धास्त होतो…! 

मनातलं काही …

  1. Zee Yuva TV यांनी”सामाजिक” या कॅटेगरीमध्ये मला आणि मनीषाला एक मोठा पुरस्कार दिला.

अगदी खरं सांगायचं तर या पुरस्कारावर आमचा हक्क नाही, तुम्हा सर्वांचा हक्क आहे….! 

अगदी मनापासून बोलतोय मी हे…. कारण तुम्ही सर्वजण काहीतरी देत आहात;  आम्ही फक्त ते तळागाळात पोचवत आहोत… 

रेल्वे स्टेशनवर एखादी बॅग हमालाने डोक्यावर घेतली म्हणून तो त्याचा मालक होत नाही…. मालक कुणीतरी वेगळा असतो….! आमच्याही बाबतीत तेच आहे…. आपण दिलेली जबाबदारी; आम्ही फक्त आमच्या डोक्यावर घेतली आहे, आम्ही मालक नाही…. आम्ही फक्त भारवाहक आहोत…. मालक आपण सर्वजण आहात….!!! 

  1. माझे आजोबा कै. नामदेवराव व्हटकर ! (माझ्या आईचे वडील)… कवी, लेखक, गीतकार, संगीतकार, अभिनेता असं चतुरस्त्र व्यक्तिमत्व….!ते आदरणीय बाबासाहेब आंबेडकर यांचे निस्सीम भक्त होते. 

आदरणीय बाबासाहेब अनंतात विलीन झाल्यानंतर, आजोबांनी स्वतःचे घर आणि छापखाना विकून बाबासाहेबांची अंतिम यात्रा चित्रबद्ध करून ठेवली आहे…. या एका चित्रफिती शिवाय, बाबासाहेबांची अंतिम यात्रेची चित्रफीत जगामध्ये इतरत्र कुठेही नाही… 

जवळची व्यक्ती गेल्यानंतर प्रत्येकाची धडपड असते, आपल्या त्या प्रिय व्यक्तीचे शेवटचे दर्शन घ्यावे. 

आदरणीय बाबासाहेबांना आई किंवा वडीलच मानणाऱ्या करोडो कुटुंबीयांना मात्र या अंतिम दर्शनाचे भाग्य मिळाले नाही… 

माझ्या आजोबांनी तयार केलेल्या, जगात एकमेव असणाऱ्या, या चित्रफितीमुळे आदरणीय बाबासाहेबांच्या समस्त भारतीय कुटुंबीयांना आता आदरणीय बाबासाहेबांचे शेवटचे दर्शन घेता येईल. 

आदरणीय बाबासाहेबांच्या चरित्रावर आधारित महापरिनिर्वाण या नावाने एक सिनेमा नुकताच येऊ घातला आहे. या चित्रपटामध्ये आदरणीय बाबासाहेबांच्या अंतिम यात्रेचे दर्शन सर्वांना नक्की घडेल…! 

या चित्रपटामध्ये माझ्या आजोबांचाही जीवनपट ओघाओघाने आला आहे…. 

माझ्या आजोबांची भूमिका करत आहेत, सुप्रसिद्ध अभिनेता श्री प्रसाद ओक..! 

हि चित्रफीत बनवून माझ्या आजोबांनी समस्त भारतीयांवर उपकार केले आहेत…. असं माझं प्रांजळ मत आहे….!

असो, भाषेची गरज फक्त बोलण्यासाठी असते, समजून घेण्यासाठी भावना पुरेशा असतात….! 

मनातील सर्व भावना आज आपल्या पायाशी ठेवत आहे…. !!! 

प्रणाम  !!!

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “पसायदान…” ☆ सौ. अंजोर चाफेकर ☆

सौ. अंजोर चाफेकर

??

☆ “पसायदान…” ☆ सौ. अंजोर चाफेकर

मी जेव्हा जेव्हा माझ्या मिस्टरांना घेऊन अंबानी हाॅस्पिटलला जाते तेव्हा माझे मन नैराश्यानी ग्रासून जाते.

जातानाच मन उदास असते. माझ्याच नशीबी या वा-रा 

का?

पण तिथे पोचल्यावर जेव्हा आजूबाजूचे पेशन्टस् बघते 

तेव्हा वाटतं माझा नवरा या कॅन्सरवर मात करून 

नाॅर्मल आयूष्य जगतोय तरी. 

किती तरुण मुले, किती लहान मुले, अजून त्यांनी जगही पाहिले नाही.त्यांच्या आई वडिलांच्या डोळ्यात तरळणारे दुःख मन पिळवटून टाकते.

कितीतरी वयस्क, त्यांची हतबलता, त्यांना सावरणारी अर्धांगिनी, ती ही कापणा-रा हातानी, मनातली भीती 

न दाखवणारी. 

त्यांच्याबरोबर आलेला त्यांचा मुलगा, तोही पन्नाशीजवळ 

आलेला, ऑफीसला रजा टाकून. मधे मधे तो ऑफीसचे फोन अटेन्ड करतोय. तो ही या युगातला श्रावणच. 

कुणाच्या हाताला सलाईनच्या नळ्या,कुणी यूरीनची बॅग 

सांभाळत,कुणी व्हीलचेअर वर 

प्रत्येकाचे दुःख वेगळे पण डोळ्यात तेच केविलवाणे भाव. 

अशावेळी मलाही पसायदान आठवते. 

देवा तू सर्वांना सुखी का नाही ठेवत.?

या शारीरिक वेदना कशासाठी?

आणि गरीबांनी काय करायचे  ?

त्यांना तर या महागड्या ट्रीटमेन्टस् कशा परवडणार?

या खेळात तुला कसली गंमत वाटते.?

©  सौ.अंजोर चाफेकर, मुंबई.

≈संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ पराभव… – मूळ लेखक : श्री अभिनव श्रीवास्तव ☆ श्री सुहास सोहोनी ☆

श्री सुहास सोहोनी

? मनमंजुषेतून ?

पराभव… – मूळ लेखक : श्री अभिनव श्रीवास्तव ☆ श्री सुहास सोहोनी ☆

जिल्हा शिक्षणाधिकारी झाल्यानंतर जेव्हा मी कामावर रुजू झालो, तेव्हा असे समजले की, हा जिल्हा शालेय शिक्षण स्तरावर खूपच मागे पडला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही सांगितले की “आपण ग्रामीण भागकडे जास्त लक्ष द्यावे.”

बस, ठरवून टाकलं की महिन्यातले आठ ते दहा दिवस फक्त ग्रामीण शाळांसाठीच  काढायचे.

लगेचच ग्रामीण भागातल्या दौऱ्याची मोहीम सुरू केली. काही भाग डोंगराळ व जंगली  होते.

एके दिवशी सोबत काम करणाऱ्या कर्मचाऱ्याकडून समजले, की एका डोंगराळ भागात ‘बडेरी’ नावाचे एक गांव आहे. तिथे कोणीही शिक्षणाधिकारी जात नसत. कारण तिथे पोहोचण्यासाठी वाहन सोडून जवळजवळ दोन-तीन किलोमीटर्सचे अंतर डोंगराळ रस्त्यातून चालत जावे लागत असे.

मग ठरवलं की दुसऱ्याच दिवशी तिथे जायला हवे.

तिथे कोणीतरी पी. के. व्यास नांवाचे मुख्याध्यापक होते. खूप वर्षांपासून ते त्या पदावर होते. आणि कां कोण जाणे, ते पद  सोडतही नव्हते. मी आदेश दिला की “त्यांना कोणीही आगाऊ सूचना देऊ नये.  ही अचानक भेट असेल.”

दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही लवकरच निघालो. दुपारी बारा वाजता वाहन चालकाने सांगितले की साहेब इथून पुढे दोन-तीन किलोमीटर डोंगरातून चालत जावे लागेल.

मी आणि माझे दोन सहकारी, चालत निघालो. जवळजवळ दीड तास होऊन गेला असेल. डोंगराळ, कच्च्या रस्त्यावरून आम्ही वरती गावात जाऊन पोहोचलो.

समोरच शाळेची पक्की इमारत होती आणि जवळ जवळ दोनशे कच्ची घरे होती.

शाळा छान स्वच्छ रंगवलेली होती. फक्त तीनच वर्ग आणि प्रशस्त व्हरांडा. चारी बाजूंनी हिरवीगार वनराई.

वर्गात गेलो तर तिन्ही वर्गात जवळपास दीडशेमुलं अभ्यासात गर्क होती. खरं तर तिथे कोणीही शिक्षक नव्हता. एक वयस्क गृहस्थ व्हरान्ड्यात उभे होते. ते तिथे बहुधा शिपायाचे काम करीत असावेत.

त्याने सांगितलं की मुख्याध्यापक गुरुजी एव्हढ्यातच येतील.

आम्ही व्हरांड्यात जाऊन बसलो, तेव्हा बघितलं की एक चाळीस-बेचाळीस वर्षांचे सद्गृहस्थ, आपल्या दोन्ही हातांमध्ये पाण्याच्या बादल्या घेऊन वर येत होते. पायजमा गुडघ्यापर्यंत ओढून घेतला होता आणि वर खादीचा कुर्ता होता.

त्यांनी येताच आपला परिचय दिला, “मी प्रशांत व्यास, इथला मुख्याध्यापक आहे. इथे या मुलांसाठी प्यायचे पाणी जरा खालून विहिरीतून आणावे लागते. आमचे शिपाई दादा जरा वृद्ध आहेत. आता त्यांच्याच्याने होत नाही म्हणून मीच घेऊन येतो. कसरतही होते.” ते हसून म्हणाले.

त्यांचा चेहरा ओळखीचा वाटला व नांव ही ओळखीचे वाटले. मी त्यांच्याकडे पाहून विचारले, “तुम्ही प्रशांत व्यास म्हणजे इंदूरच्या गुजराती कॉलेजमध्ये होते तेच कां?”

त्यांनी सुद्धा ओळखल्यासारखे  आश्चर्याने विचारले, “आपण अभिनव आहात कां? अभिनव श्रीवास्तव !” मी म्हणालो, “होय भाऊ, मी तोच आहे.”

वीस-बावीस वर्षांपूर्वी इंदूरला आम्ही एकत्र शिकत होतो. तो खूप हुशार आणि अभ्यासू विद्यार्थी होता. खूप मेहनत करूनही, कधी तरीच मला त्याच्यापेक्षा जास्त गुण मिळाले असतील.

आमच्यात नेहमीच एक चढाओढ असायची. ज्यात तोच नेहमी पुढे असायचा.

आज तो मुख्याध्यापक होता आणि मी जिल्हा- शिक्षणाधिकारी होतो. पहिल्यांदाच त्याच्या पुढे गेल्याचे, जिंकल्याचे समाधान वाटत होते. आणि खरं सांगायचं तर, मनांतूनही मी खूप खुष  होतो.

मी सहजच विचारलं की “इथे कसा काय आणि घरी कोण कोण आहे?”

त्याने सविस्तर सांगायला सुरुवात केली, “एम. कॉमच्या वेळेस वडिलांची मालवा मिलची नोकरी गेली. त्यांना दम्याचा आजारही होता. घर चालवणं खूपच कठीण झालं होतं. कसं तरी शिक्षण पूर्ण केलं. मार्क चांगले असले, तरी सहशिक्षक म्हणून नियुक्त झालो. पण नोकरी सोडूही शकत नव्हतो. पुढे शिकण्याची आशाही नव्हती आणि परिस्थितीही नव्हती. या गांवात बदली मिळाली.  आई-वडिलांना घेऊन इथे आलो. म्हटलं गावात थोड कमी पैशात  निभावून जाईल.

मग तो हसत म्हणाला, “अशा दुर्गम गांवात बदली, म्हातारे, आजारी आई-वडील, यांच्याकडे बघून कोणी मुलगी द्यायला तयार होईना. म्हणून लग्नही नाही झालं. आणि बरोबरच आहे. कोणतीही शिकलेली मुलगी इथे काय करू शकली असती?

माझी काही वरपर्यंत ओळखही नव्हती की इथून बदली करून घेऊ. मग इथेच स्थायिक झालो.

इथे आल्यानंतर काही वर्षांनी आई-वडील दोघेही देवाघरी गेले. जेव्हढी जमेल तशी त्यांची सेवा करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केला.”

“आता इथे मुलांमध्ये शाळेत मन रमून गेले. सुट्टीच्या दिवशी मुलांना घेऊन आजूबाजूच्या डोंगरांवर वृक्षारोपण करायला जातो. 

रोज संध्याकाळी शाळेच्या व्हरांड्यात प्रौढांना शिकवतो. आता मी म्हणू शकतो की या गांवात कोणीही निरीक्षर नाही. नशा मुक्तीचे अभियान ही चालवतो.

स्वतःच्या हाताने जेवण बनवतो आणि पुस्तके वाचतो. मुलांना चांगले मूल्य शिक्षण मिळावे, चांगले संस्कार मिळावे, नियमितता शिकवावी, बस एवढेच माझे ध्येय आहे.

मनांत होतं, पण मी सी. ए. करूच शकलो नाही. पण माझे दोन विद्यार्थी सी.ए. आहेत ! आणि काही जण चांगल्या नोकरीतही आहेत.”

“माझा इथे काहीच जास्त खर्च नसतो. माझा पगार जास्त करून या मुलांच्या खेळण्यासाठी व शाळेसाठी खर्च होतो.

तुला तर माहीतच आहे. कॉलेजपासून मला क्रिकेटची खूप आवड होती. ती, या मुलांबरोबर खेळून पूर्ण होते. खूप समाधान वाटते.”

मी मधेच म्हणालो, “आई वडील गेल्यानंतर लग्नाचा विचार केला नाही का?”

तो हसून म्हणाला, “मला कळतं की जगातील सर्व चांगल्या गोष्टी माझ्यासाठी बनलेल्या नाहीत. म्हणून जे समोर येते, ते चांगले बनवण्याचा प्रयत्न मी करीत असतो.”

त्याच्या त्या सहज हसण्याने मला आत खोलवर चिंब भिजवून टाकले.

निघतांना मी त्याला म्हणालो “प्रशांत! जेव्हा लागेल तेव्हा तुझी बदली मुख्यालयात किंवा तुला हवी असेल तिथे मी करून देईन”.

तो हसून म्हणाला “आता खूप उशीर झाला आहे. आता इथेच, या लोकांमध्ये मी आनंदात आहे.” असे म्हणून त्याने हात जोडले.

नोकरीत त्याच्यापेक्षा वरच्या पदावर आपली नियुक्ती झाल्याच्या यशामुळे माझ्या मनांत निर्माण झालेला अहंकार, गर्व 

हे सारे भ्रम एका क्षणांतच विरून  गेले !!

तो आपल्या जीवनात, त्रुटी, कष्ट  आणि  असुविधा असूनही खूप समाधानी होता. त्याचे हे सात्विक समाधान पाहून मी विस्मयचकीत  झालो. त्याच्या वागणुकीत कुठल्याही प्रकारच्या दु:खाचा किंवा तक्रारीचा सूर नव्हता.

आपण माणसांची पारख, सुख – सुविधा, उपलब्धता, सेवा यांच्या आधारावर करत असतो. परंतु तो, या सर्वांशिवाय सुद्धा, परत मला मागे टाकून पुढे निघून गेला.

निघताना, त्या ‘कर्मऋषी’ला हात जोडून, भारावलेल्या मनाने मी एवढेच म्हणू शकलो, “तुझ्या या पुण्य कामात, कधी माझी आवश्यकता वाटली, तर माझी आठवण जरूर ठेव, मित्रा!”

सारांश: 

आपले प्रशासकीय पद काय आहे किंवा काय होते, हे खरोखरच महत्त्वाचे नसते. महत्त्वाचे हे असते की, माणूस म्हणून आपण कसे आहोत आणि कसे बनत आहोत.

मूळ लेखक : श्री अभिनव श्रीवास्तव 

प्रस्तुती : श्री सुहास सोहोनी

मो ९४०३०९८११०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ संधीकाल… ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे

??

☆ संधीकाल… ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे

माॅर्निग वाॅकला बाहेर पडले की ट्रॅकवर विविध वयाची, विविध तऱ्हेची माणसं भेटतात.तसाच तिथला निसर्ग ही वेळ काळानुसार बदलता दिसतो. 

अत्ता अत्ता पर्यंत हिरवेगार दिसणारे वृक्ष शिशिराच्या पानगळतीमुळे कसे उघडे बोडके दिसू लागले ते लक्षातच येत नाही. गुलमोहराची लांब लांब छोट्या छोट्या पर्णिका असलेली पाने चवऱ्या ढाळत असतात तर त्यावरील वाळलेल्या शेंगा तुटून खाली पडत असतात.त्यांच्यावर पाय पडला की कट्कन मोडतील इतक्या वाळक्या असतात. जणू निसर्ग कसा वाळत,सुकत चाललाय याची जाणीव करून देत असतात.

आंबा,फणस,वड यासारखी छाया आणि फळे देणारी झाडे जवळपास दिसत नाहीत,पण गुलमोहर,कॅकेशिया सारखी रंगीबेरंगी केशरी,जांभळी, गुलाबी रंगांची फुले असणारी झाडे मात्र रस्तोरस्ती दिसतात ! गंध नसला तरी त्यांची रंगांची विविधता डोळ्यांना सुखवते.थंडीची ऊब गेली रे गेली की सकाळच्या वेळी सूर्याचे आगमन प्रसन्न वाटते.इथल्या झाडांवर भारद्वाज आणि कोकिळा आपले अस्तित्व दाखवू लागतात.राखाडी रंगाच्या चिवचिव चिमण्या अंगणात दाणे टिपताना दिसत नाहीत पण चिमणीसारखाच एक छोटा पक्षी सगळीकडे झाडांवर दिसतो..

होळी जसजशी जवळ येते तसा निसर्गातील बदल अगदी स्पष्ट दिसायला लागतो. वाळकी झाडे, फांद्या होळीच्या ज्वाळेत टाकून सगळं वाईट नष्ट करून नवीन जगण्याला सुरूवात करावी त्याचेच हे प्रतीक म्हणजे निसर्गातील झाडेझुडपे असतात.

आता पंधरा दिवसांतच चैत्र येईल.चैत्राची सुरुवात म्हणजे सृजनाची चाहुल ! मग सुरू होईल खरा वसंतोत्सव ! रंगपंचमीला विविध रंग आणि पाणी उडवून उन्हाळ्याचे स्वागत केले जाते.सूर्याच्या वाढत्या झळांपासून संरक्षणासाठी निसर्ग आपल्याला छान फळे पुरवतो. कोकम, कैरी यांचे पन्हे शीतल असते तर कलिंगड, खरबूज सारखी फळे थंडावा देतात.आपली संस्कृती निसर्गाशी जोडलेली आहे हे तर माहिती आहे आपल्याला ! चैत्रामध्ये चैत्र गौरीची पूजा करून आपण तिचा उत्सव साजरा करतो. घराघरातून पन्हं, कैरीची डाळ करून हळदीकुंकू केले जाते.देवीला झोपाळ्यावर बसून झुलवले जाते.देवीची आरास करायची, गुलाब पाण्याचे सिंचन करायचे, वाळा, मोगरा घालून माठातील पाणी सुगंधित ठेवायचे … किती किती तऱ्हांनी आपण चैत्र वैशाखाचा वणवा सौम्य करण्याचा प्रयत्न करतो.

फाल्गुन पौर्णिमा झाली की पुढचे पंधरा दिवस म्हणजे संधीकाल वाटतो मला! उन्हाळ्याची सुरुवात आणि थंडीचा शेवट! सकाळचा गारवा अजून सुखद वाटतो.पहिल्यातून अजून मन बाहेर पडत असते, तर दुसऱ्यामध्ये अजून पदार्पण व्हायचं असतं! असा हा संधीकाल! मन आणि शरीर थोडे अस्थिर होणारच! नवीन वातावरणाला अनुकूल होण्यासाठी शरीरही थोडे कुरकुरत असतेच!

असा हा संधीकाल आयुष्यातही खूपदा डोकावतो. शाळा संपवून पुढील शिक्षणात पदार्पण करताना, शिक्षण संपवून नोकरी, उद्योगात प्रवेश करताना, गृहस्थाश्रम स्वीकारताना आणि नंतर संसारातून मुक्तता घेऊन ज्येष्ठत्त्व स्वीकारताना ! प्रत्येक स्थित्यंतराच्यावेळी थोडेतरी पाऊल अडखळतेच! मन ठेचकाळतं, पुढच्या आशा खुणावत असतात, मन मागेच रेंगाळत असते. असाही एक संधीकाल असतो. जो माणसाला सुखदुःखाच्या उंबरठ्यावर ठेवतो.त्यामुळे वाटते,संधीकाल म्हणजे हुरहूर लावणारा काळ! जो प्रत्येक क्षणाला लंबकासारखा हेलकावे असतो.कधी भूतकाळात तर कधी भविष्यात! वर्तमानाच्या उंबरठ्यावर क्षणभरच टेकतो तो, दोन्हीची सांगड घालीत!

निसर्ग हा नेहमी आशावादी असतो.पडलेल्या बी तून नवीन निर्माण करणारा! झाडाच्या वठत चाललेल्या खोडातही कुठूनतरी कोंब निर्माण करणारा! काही काळ तो सुप्तावस्थेत असेलही पण अनुकूल परिस्थिती येताच तरारून वर येणारा! निसर्गाचा चमत्कार वसंत ऋतूतील पालवीत दिसतो,गुलमोहराच्या केशरी फुलांत दिसतो, तर मोगरीच्या छोट्या कळीत दिसतो.

असा हा संधीकाल मी अनुभवते आहे.-निसर्गात आणि मनात! निसर्ग चिरंतन आहे.तो बदलत्या प्रत्येक गोष्टीचा साक्षीदार आहे.त्याच्यापुढे आपण  तर नगण्य आहोत.छोट्या आयुष्यातले छोटे छोटे बदल स्वीकारताना सुध्दा संधीकालात अडकून पडणारे! पुढे पाऊल टाकू की नको या संभ्रमात असणारे! शेवटी प्रेरणा देणारा तोच आहे, त्यामुळे प्रत्येक संक्रमणात तोच आपल्याला अलगद नेतो.

या संधीकालातून पुढे नेणारा .. आपल्या प्रत्येक पावलावर आशेचा किरण दाखवणाऱ्या नियंत्याला नमन करून सकाळचे प्रत्येक पाऊल मला अधिक ऊर्जा देऊ दे अशी प्रार्थना करत मी सकाळची फेरी संपवते !

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

पुणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मी मतदार — भाग – १० ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? मनमंजुषेतून ?

☆ मी मतदार — भाग – १० ☆ श्री सुनील देशपांडे ☆

मी गोंधळलेला.

आत्तापर्यंतच्या एकूण नऊ लेखांपासून मी माझ्या मतदानाविषयीच्या गोंधळाबद्दल आणि कन्फ्यूजन बद्दल लिहिले आहे. या लेखाद्वारे एक अंतिम गोंधळ आपल्यासमोर मांडतो आहे.

आजची सामाजिक आणि राजकीय परिस्थिती पाहता जे दिसते आहे तीच परिस्थिती घटनाकारांना अपेक्षित होती का ? लोकशाही म्हणजे हीच परिस्थिती का ? तसे असेल तर आपल्याला खरेच लोकशाही योग्य आहे का ? नसेल तर आपण लोकशाही योग्य पद्धतीने राबवली नाही असे म्हणावे काय ? शेवटी लहान मुलाच्या हातात एखादे छान, कितीही चांगले आणि भारी खेळणे दिले तरी तो त्याची मोडतोडच करतो. त्याप्रमाणे लोकशाही संकल्पना ज्यांच्या मनामध्ये, वृत्तीमध्ये नीट रुजलीच नाही, त्यांच्या हातात घटनाकारांनी ही राज्यघटना देऊन, तसेच तर केले नाही ना ?

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जातीअंताची लढाई सुरू केली होती. आज ७५ वर्षाने जाती संघर्षाची लढाई आणि जाती विभाजनाची लढाई मोठ्या प्रमाणावर चालू आहे. हेच अपेक्षित होतं ? प्रजा हीच सार्वभौम ? खरंच तसं आहे ? सर्व समाज घटकांचा समतोल विकास, खरंच होतो आहे ? सर्वांना समान संधी खरच मिळते आहे ? शिक्षणाला सर्वाधिक महत्त्व खरंच आज आहे ? समता आणि बंधूभाव हा कुठे दिसतो आहे ?

सत्तर वर्षांपूर्वीची लोकशाही बाबत पाहिलेली स्वप्ने आम्हालाही माहित आहेत. आमच्यापेक्षा पंधरा-वीस वर्षांनी मोठे असलेल्यांनी ती आमच्याही डोक्यात भरवली होती. त्या स्वप्नांचा चक्काचूर झालेला पाहताना आनंद होईल ?

अशीच परिस्थिती. मागील पानावरून पुढे चालू राहणार असेल तर …….

मी मत का द्यावं ?

मी मत द्यावं का ?

मी पूर्णपणे गोंधळलेला

आणि कन्फ्यूज्ड (?)

© श्री सुनील देशपांडे

नाशिक मो – 9657709640 ईमेल  : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ बाबांची आठवण… ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

श्री मकरंद पिंपुटकर

? मनमंजुषेतून ?

बाबांची आठवण… ☆ श्री मकरंद पिंपुटकर

मी सातवी आठवीत असतानाची गोष्ट. आम्ही गुजरातमध्ये उंबरगावला राहायचो तेव्हा, तालुक्याचं ठिकाण असलेलं छोटंसं गाव. बाबा तिथल्या एका को ऑपरेटिव्ह बँकेत होते. 

संध्याकाळी घरी आले की तडक ते परसदारातल्या त्यांच्या छोट्याश्या बागेत जायचे. गुलाबाभोवतीचं तण काढ, तुळशीला पाणी दे, अबोलीभोवतीची माती उकर, कडीपत्त्याकडे लक्ष दे – काही ना काहीतरी खुडबुड करायचे ते. 

सुट्टीचा दिवस असला किंवा शनिवारी अर्धा दिवस असला की मग घरात काहीतरी काम काढून बसायचे ते. 

एखाद्या खुर्चीचा डुगडुगता पाय दुरुस्त कर, आरामखुर्चीचं कापड शिवून घे, कंदिलाच्या काचा स्वच्छ कर, झोपाळ्याला varnish लाव, पितळ्याचे कडी कोयंडे ब्रासो लावून घासून पुसून चकचकीत कर – काही ना काही उद्योग चालू असायचे त्यांचे. 

किंवा काहीच नाही तर त्यांनीच बनवलेल्या लाकडी बाकावर बसून सूर्यास्त बघत बसायचे ते, कधी एकटे – कधी आई निवांत असली तर तिच्याबरोबर. 

बाबा घरी यायचे, त्यासुमारास मी खेळून परत आलेलो असायचो. शनिवारी रविवारी घरात कुठेतरी पसरलेला असायचो – चांदोबा, चंपक, किशोर काहीतरी वाचत बसलेलो असायचो. 

ते मला हटकून बोलवायचे. बागेत मदत करायला बोलवायचे, किंवा ते डुगडुगतं स्टूल धरायला बोलवायचे, किंवा काहीच नाही तर बाकावर बसले की सूर्यास्त बघायला शेजारच्या जागी बसायला बोलवायचे. 

मला ते कंटाळवाणं वाटायचं, मी शक्यतो काही ना काही बहाणा काढून टाळायचो, तेही फार आग्रह धरायचे नाहीत.

आज या गोष्टीला तीस चाळीस वर्षे होऊन गेली. आज बाबा नाहीत. ते गावही कधीच सुटलं.

आज मी चिंचवडला एका फ्लॅटमध्ये राहतो, गॅलरीत थोड्याफार कुंड्या आहेत, दुसऱ्या गॅलरीतून संध्याकाळी सूर्यास्त दिसतो. आता कुंड्यांशी खुडबुड मी करतो, गॅलरीतून सूर्यास्त मी बघतो.

पण आता माझी लेक शिक्षणासाठी मुंबईला गेली आहे. 

आज जाणवतं आहे.  आपल्याबरोबर वेळ घालवण्यासाठी, बाबांनी काय किंवा मी काय, मुलांना जास्त ठामपणे सांगायला हवं होतं – आग्रह धरायला हवा होता. वरवर जरी त्यांनी नाराजी दाखवली, तरी तुमच्या वागण्या – बोलण्याला ते बघत असतात, त्याने प्रभावित होत असतात, ते आत्मसात करत असतात. 

तुमचा ठसा त्यांच्यावर उमटत असतो.

आणि माझ्या मुलीला आणि तिच्या वयाच्या मुलांना मी म्हणेन, आईबाबा जेव्हा केव्हा तुम्हाला असं बोलावतील, तेव्हा त्यांना प्रतिसाद देत जा, आज नाही म्हणालात तर, माझ्यासारखा, उद्या हा आठवणींचा खजिना तुम्हीही गमावून बसाल.

(आधारित)

© श्री मकरंद पिंपुटकर

चिंचवड

मो ८६९८०५३२१५   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मी मतदार — भाग – ९ ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? मनमंजुषेतून ?

☆ मी मतदार — भाग – ९ ☆ श्री सुनील देशपांडे ☆

मी गोंधळलेला.

एका बाबतीत माझा खूप गोंधळ उडतो.

असं बघा, समजा एक उमेदवार आहे. आपल्या मतदारसंघात उभा आहे. त्याने आपल्या मतदारसंघासाठी खूप कामे केली आहेत. त्याचप्रमाणे त्याने आपली वैयक्तिक कामे सुद्धा केली आहेत. आपले आणि त्याचे संबंध खूप चांगले आहेत. अशावेळी आपण त्यालाच मत देणार ना ?

पण वस्तुस्थिती जर अशी असेल, की आपल्याला माहित आहे, पूर्वी तो नगरसेवक होता, मागील टर्म मध्ये आमदारही होता. त्याचा प्रवास आपण आपल्या गल्लीतून कफल्लक पासून कोट्याधीश होण्यापर्यंत आपल्या डोळ्यांनी पाहिला आहे. त्यांने पैसा कशा मार्गाने कमावला आहे हे कित्येक वर्ष आपल्या डोळ्यासमोर आहे. तो आपल्या मतदारसंघात चांगला असला तरी इतर ठिकाणी दादागिरी, गुंडगिरी, भ्रष्टाचार सगळ्या गोष्टी करतो आहे. मग मी त्याला मत द्यावं का ? जर तो माझ्या मतदारसंघाचे भलं करत असेल आणि मला वैयक्तिकही उपयोगाला पडत असेल, माझ्या सगळ्या अडचणीतून कायम मार्ग काढत असेल, तर मी त्याला का मत देऊ नये ?

पण जर मी त्याला मत दिलं तर पाचशे रुपये आणि दारूची बाटली घेऊन मत देणाऱ्या भणंग मतदाराच्या पेक्षा मी किती वेगळा आहे ?

मी पूर्णपणे गोंधळलेला

आणि कन्फ्यूज्ड (?)

© श्री सुनील देशपांडे

नाशिक मो – 9657709640 ईमेल  : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆– २००१ सालची एक आनंददायी आठवण — ☆ पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर ☆

पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

? मनमंजुषेतून ?

☆ – २००१ सालची एक आनंददायी आठवण – ☆ पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर. ☆

दि. २७ मार्च …. महान तबला वादक आदरणीय श्री. पंढरीनाथ नागेशकर यांची जयंती ! 

त्यानिमित्त त्यांची सुखद आठवण तुम्हां सर्वांबरोबर शेअर करावीशी वाटते…

माटुंग्याच्या कर्नाटक संघ हॉलमध्ये मी, सुनील आणि आदित्य – एका तबला वादकाच्या कार्यक्रमास निमंत्रणावरून ऐकावयास गेलो. तत्पूर्वी घरी एका कार्यक्रमाची रिहर्सल चालल्यामुळे, कार्यक्रमाला पोहोचण्यास आम्हाला उशीर झाला. आम्ही गेल्यावेळी कार्यक्रम जवळजवळ संपतच आला होता. उशिरा पोहोचल्याबद्दल मला जरा अपराधीच वाटत होतं. त्यामुळे आम्ही शेवटच्या खुर्च्यांवर जरी बसलो, तरी बरेच ओळखीचे चेहरे आम्हाला पाहत होते, येऊन भेटत होते. कार्यक्रम संपल्यावर, त्या तबलजींचे  आभार मानून, तसंच त्यांचे गुरू पंडित सुरेशजी तळवलकर यांना भेटून, आम्ही तिथंच थोडा वेळ गप्पा मारत उभे होतो. तिथं सभागृहाच्या मध्यभागी एक तपस्वी (साधारण ऐंशी-एक वर्षांचे), अनेक शिष्यगणांना आशीर्वाद देत होते. मी सर्वांच्या मधेच जाऊन लुडबुड करणं, मला शिष्टसंमत वाटेना. मी त्या तबलजींना विचारलं, “ते वयस्कर सद्गृहस्थ कोण?” ते उत्तरले, “वे तो हमारे गुरुजी पंडित तळवलकर जी के गुरू हैं – तबला नवाझ पंडित पंढरीनाथ नागेशकर जी!” एकदा मनात आलं, जाऊन त्यांना नमस्कार करावा. पण आपणहून सर्वांच्या पुढं पुढं करणं, हा माझा स्वभाव नसल्याने, मला तिथली काही मंडळी जरी ओळखत असली, तरी मी एका कोपर्‍यात सुनील व आदित्यसवे शांतपणे उभी होते. इतक्यात पंडित नागेशकरजी, नेमके मी उभी असलेल्या कोपर्‍यात त्यांची चप्पल असल्याने, तिथेच आले. त्यांना प्रत्यक्ष समोर  पाहून मात्र ते मला ओळखोत वा न ओळखो, त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी मी त्यांना वाकून नमस्कार केला व म्हटले, “नमस्कार, मी पद्मजा फेणाणी जोगळेकर.” एवढ्यात त्यांनी मला आश्चर्याचा सुखद धक्काच दिला. ते म्हणाले, “अरे, मी ओळखतो की तुम्हाला. तुम्ही तर केवढ्या मोठ्या कलाकार! तुमचं फार चांगलं आणि मोठं नाव होतंय, हे पाहून मला खूप आनंद होतो. तुम्ही गोव्याला आमच्या घरी येऊन माझ्यासमोर, माझ्या मुलाबरोबर – विभवबरोबर तबल्यावर, शांतादुर्गेच्या कवळे मठाच्या मंदिरात क्लासिकल कॉन्फरन्सची रिहर्सल केलीत.” नंतर काही काळ ते आमच्या कोंकणीतून सुनीलची व आदित्यची चौकशी करत होते. आतापावेतो मी केवळ लाजेने चूर-चूर झाले होते. बापरे, मी त्या तपस्व्याला चेहऱ्याने ओळखू शकले नाही परंतु त्यांनी तर २० वर्षांपूर्वीचे सर्व कथन केले!

एवढ्यात त्यांनी आणखीन एक बॉम्ब टाकला. त्यांचे शिष्यगण त्यांना जेवायला बोलावण्यास आले व म्हणाले, “गुरुजी, लवकर चला, नाहीतर जेवायला मिळणार नाही..!” परंतु गुरुजी कसचे मिश्कील! त्यांनी म्हटले, “जेवण नाही मिळाले तरी चालेल, कारण आता पद्मजा भेटली, पुरे झाले!” यावर आम्ही सगळे दिलखुलासपणे हसलो…. 

या वयातही त्यांची अफाट स्मरणशक्ती, त्यादिवशी सकाळी १० ते रात्री १० पर्यंत शिष्यांचे प्रेमाने ऐकून घेत, खाली मांडी घालून बसण्याची सहनशक्ती, मिश्कीलपणा, बुद्धिचातुर्य व कमालीचा प्रांजळपणा पाहून मी, माझी बोटे केवळ तोंडात घालायची बाकी होते!! ही मंडळी माझ्यासारख्या लहानांना किती जबरदस्त प्रोत्साहन देतात हे खरेच शिकण्यासारखे होते. 

कार्यक्रम जरी फारसा ऐकायला मिळाला नाही तरी एका अत्यंत गुणी, महान साधू पुरुषाची भेट झाली आणि या दिग्गज कलाकाराकडून प्रेमपूर्वक आशीर्वाद तसंच प्रचंड ऊर्जा मिळाल्याच्या अवर्णनीय आनंदात होते मी!

© पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मी मतदार — भाग – ८ ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? मनमंजुषेतून ?

☆ मी मतदार — भाग – ८ ☆ श्री सुनील देशपांडे ☆

मी गोंधळलेला.

मत कुणाला द्यायचं याबाबतीत माझा गोंधळ होतो आहे. मला आगामी निवडणुकांच्या आत हे ठरवायचं आहे. पण कसं ठरवायचं ? इतक्या वर्षात पाहतो आहे बऱ्याच वेगवेगळ्या पक्षांची सरकारे येऊन गेली. पण कुठल्याही सरकारमुळे फार मोठा फरक किंवा बदल झाला असे दिसत नाही. हा थोड्याफार किरकोळ गोष्टी अधिक आणि उणे दोन्ही बाजूने होतात. सत्ताधारी पक्षाच्या बाजूने असणारे, सरकार किती चांगले आहे हे सांगत असतात. विरोधी पक्षाची मंडळी हे सरकार किती वाईट आहे हे सांगत असतात. सरकार बदललं की माणसं इकडची तिकडे होतात परंतु सत्ताधारी पक्ष जे बोलायचं तेच बोलतात विरोधी पक्ष जे बोलायचं तेच बोलतात. काहीच फरक नाही. कुठलंही बजेट आलं की हे बजेट कसं चांगलं आहे हे सत्ताधारी पक्ष सांगतात. हे बजेट कसं वाईट आहे हे विरोधी पक्ष सांगतात. विरोधी पक्षातील सत्तेत गेले आणि सत्तेतले पक्ष विरोधात आले तरी विरोधी पक्ष म्हणून जे मत त्यांनी व्यक्त केलेलं असतं तेच त्यांच्या विरोधी लोक बोलतात. अधिवेशनाच्या आधी चहापानावर बहिष्कार घालणं हे तर विरोधी पक्षांचे कामच. सतत तीच बातमी. कशासाठी ते चहापान ठेवतात ? आणि माध्यमे तरी या बातम्या जशाच्या तशा का सादर करतात? या सगळ्या गोष्टी पाहिल्या की सत्ताधारी पक्ष कुचकामाचा आणि विरोधी पक्ष मात्र ग्रेट आणि विरोधी पक्ष जेव्हा सत्ताधारी बनतो त्यावेळी तो कुचकामाचा ठरतो. शेवटी वेगवेगळे पुढारी वेगवेगळे नॅरेटिव्ह सेट करण्यासाठीच प्रयत्न करत असतात. एकूण विचार केला तर कुठल्याही राजकीय व्यक्तीला सामान्य माणसाच्या प्रॉब्लेम्स मध्ये फार मोठा इंटरेस्ट नसतो. त्यांना इंटरेस्ट फक्त स्वतःबद्दल प्रसिद्धी मिळवणे आणि एक विशिष्ट दिशेने समाजमनावर प्रभाव टाकण्याचा म्हणजेच नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करणे. एवढेच गरजेचं असतं असं वाटतं. भ्रष्टाचार तसाच चालू असतो. गुन्हेगारी तशीच चालू असते. आत्महत्या तशाच चालू असतात. बलात्कार तसेच चालू असतात. सरकारचं नुकसान तशाच पद्धतीने चालू असतं. दरडी कोसळत असतात. पुरामध्ये हानी होत असते. पुन्हा पुन्हा सगळ्या आपत्ती तशाच पद्धतीने येत असतात जात असतात. कॉपी करून परीक्षा पास होणे हे तसेच वर्षानुवर्षे चालू असते. कोणत्याही सरकारी कार्यालयात कोणतेही काम सहजासहजी न होणे हे तसेच चालू आहे. सरकारी काम आणि चार महिने थांब कधी कधी चार वर्षे थांब. परंतु असेच चालू आहे. न्यायव्यवस्था या नावाची जी व्यवस्था आहे त्याचा न्यायाशी फारसा संबंध आहे असे दिसत नाही. न्याय या नावाखाली जो निकाल मिळतो तो सुद्धा योग्य वेळी कधीच मिळत नाही. सच्चरित्र लोकांचा अपमान करणे. विरोधी पक्ष्यांचे चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न करणे. या सगळ्या गोष्टी कुणाकडूनच चुकलेल्या नाहीत. शेवटी कधी कधी असे वाटते की कुणालाही मत दिले तरी आपल्या परिस्थितीत काय फरक पडणार आहे ? जाऊदे कुणी का निवडून येईना. मत द्यावे का मग? का न द्यावे?

मी पूर्णपणे गोंधळलेला

आणि कन्फ्यूज्ड (?)

© श्री सुनील देशपांडे

नाशिक मो – 9657709640 ईमेल  : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈