कृष्णा, बंदी वासातून स्वातंत्र्याकडे तुझी वाटचाल काल रात्रीपासून सुरू झाली! कंसाच्या बंदीवासात देवकीच्या पोटी जन्माला येताच, दुसऱ्या क्षणी तुला तिथून स्थलांतर करावे लागले! विष्णू अवतारातील एक म्हणून पृथ्वीवर जन्माला आल्याबरोबरच तुला इथले मानवी जीवनाचे वनवास भोगावे लागले, आणि गोकुळात जाऊन तू साधा गोपाल म्हणून जगलास! इतर गोकुळ वासी मित्रांबरोबर तुझे खेळ रंगले पण ते करता करता तू किती राक्षसांचे पारिपत्य केलेस आणि दृष्टांच्या निर्दालनासाठी असलेला तुझा मानवी अवतार कार्यरत झाला! गरीब बिचाऱ्या गोपांना घरचे दूध, दही, लोणी मिळत नाही म्हणून गोपींची मडकी फोडलीस, सर्वांसोबत त्यांच्या दही काल्यात रंगून गेलास आणि समाजवादाचा एक धडा शिकवलास! जे आहे ते सर्वांनी वाटून घ्यायचं! थोडा मोठा झाल्यावर सांदिपनी ऋषींच्या आश्रमात शिकण्यासाठी गेलास! तेथे गरीब सुदाम्याशी मैत्रीचे बंध ठेवून पुढील काळात त्याचा उद्धार केलास! किशोरावस्था संपून मोठा झालास आणि कंसाचा वध करून मथुरेचे राज्य मिळवलेस!
तारुण्य सुलभ भावने ने स्वयंवरासाठी गेलास, तुला द्रौपदीची आस होती का ?की पुढे काय घडणार याचे दृश्य रूप तुला दिसले होते ?त्यामुळे पांडवांच्या पदरी द्रौपदी देऊन तू तिचा “सखा” बनलास! दुर्गा भागवत म्हणतात की, मित्र या नात्याला “सखा” हे रूप देऊन स्त्री-पुरुषातील हे नाते तू अधिक उदात्त केलेस! आयुष्यभर पांडवांची साथ देत कौरव- पांडव युद्धात तू अर्जुनाचा सारथी बनून कुरुक्षेत्रावर उतरलास, योद्धा म्हणून नाही तर सारथी बनून!एक सहज विचार मनात आला, द्रौपदीने कर्णाला ‘सूतपुत्र’ म्हणून नाकारले,! सारथ्य करणारा माणूस समाजात खालच्या स्तरावर असतो हे तिने दाखवून दिले, पण शेवटी युद्धात तू सारथी बनून जी पांडवांना मदत केलीस त्यातून तू सारथी हा सुद्धा किती महत्त्वाचा असतो हे द्रौपदीला दाखवून दिलंस का? तुझं सगळं अस्तित्वच देवरूप आणि मानव रूप यांच्या सीमेवर होतं! जन्म घेतलास त्यात तू त्याच रंगात रंगून गेलास! मगध देशाच्या लढायांना कंटाळून तू गोकुळ, मथुरा सोडून द्वारकेला पळून गेलास आणि स्वतंत्र राज्य स्थापन केलं म्हणून तुला ‘रणछोडदास’ नाव मिळालं! वेगवेगळ्या राज्यातील राजकन्यांशी विवाह करून तू साऱ्या भरत खंडाला एकत्र आणण्याचा प्रयत्न केलास! आणि अवतार कार्य समाप्त करताना एका भिल्ला च्या हातून तुझ्या तळपायाला बाण लागून तुझे जीवन कार्य संपवलेस! कृष्णा,
तुझे नाव घेतले की आपोआपच गुणदोषातून मुक्ती मिळते असं वाटतं! कारण आपण काहीही घडलं तरी “कृष्णार्पण” असा शब्द वापरून ते संपवतो. सगळं हलाहल जणू संपून जातं तुझ्या स्मरणात!
तुझा जन्म काळ मध्यरात्री येतो, तेव्हाही आम्ही वाजत गाजत तुझा जन्मोत्सव साजरा करतो. कारण अंधाराची रात्र संपून तुझ्या जन्माने उत्साहाचा आणि कर्तृत्वाचा जन्म होणार असतो. आजचा गोपाळकाला म्हणजे उत्साही कामाची सुरुवात! पावसाच्या सरींबरोबरच पुढील वर्ष आनंदात जाऊ दे हीच इच्छा आपण प्रकट करतो . चार वर्षांपूर्वी आधुनिकतेच्या नावाखाली कृष्ण किंवा परमेश्वराचे अस्तित्व न मानणारे “कोरोना” पुढे शरणागत झाले होते .तेव्हा माणसाच्या लक्षात आले की विज्ञानाने कितीही मात केली तरी एक “हातचा “तुझ्याकडे, परमात्म्याकडे आहे हे मात्र आपण मान्य केले पाहिजे!
“ प्रिय कृष्णा, आज जन्मदिन ना तुझा? खूप आनंदी असशील ना मग? “
“ नाही…. “
“.. का रे? तुझ्या सगळ्या भक्तांनी status ला फोटो टाकला नाही का तुझा? “
“ हो ठेवलं होत ना status त्यांनी. ”
“ मग? दहीहंडी फोडली नाही का त्यांनी? “
“ हो, ते ही केलं… “
“ अरे मग? अच्छा, लवकर आटपला का त्यांनी कार्यक्रम? खूप वेळ नाचले नाही का ते तुझ्यासाठी trending गाण्यांवर? “
“ हो. झालं ते ही करून झालं की …”
“मग? तरी तू का खूष नाहीस? नैवेद्य ( भोग ) आवडला नाही का? तरीही मी आईला सांगत होते की जरा बाहेरून मागव काहीतरी स्पेशल. कृष्ण पण तेच तेच खाऊन कंटाळत असेलच की, पण नाही. ऐकेल ती आई कुठली ? एक काम करते, तुझ्यासाठी काहीतरी स्पेशल ऑर्डर करते. ”
“अगं कशाला ? नको ग.. एवढं सगळं तरी कशाला करायचं आता तुम्ही माझ्यासाठी…. जो काही माझ्या जन्मदिनाचा इव्हेंट करून ठेवला आहात ना तुम्ही, त्यानेच पोट भरलं माझं….. दमला असाल ना तुम्ही माझ्या नावाचं निमित्त करून हा “ इव्हेंट “ एंजॉय करता करता…. मग आता तुमच्यासाठीच ऑर्डर करा…. स्पेशल काहीतरी… खरंतर तेही एव्हाना झालंच असेल म्हणा… असो.. सुखी रहा.. “
(काही तांत्रिक कारणामुळे ” माझी जडणघडण ” या लेखमालिकेचा भाग आठवा दि. २७/८/२४ रोजी प्रकाशित होऊ शकला नाही, तो आजच्या अंकात प्रकाशित करत आहोत. वाचकांनी कृपया नोंद घ्यावी.)
आनंद आमच्या घरासमोर “गजाची चाळ” होती. वास्तविक चाळ म्हटल्यावर जे चित्र डोळ्यासमोर येते तशी ती चाळ नव्हती. एक मजली इमारत होती आणि वरच्या मजल्यावर गजा आणि दोन कुटुंबे आणि खालच्या मजल्यावर तीन कुटुंबे राहत होती. पण तरीही गल्लीत ती “गजाची चाळ” म्हणूनच संबोधल्या जात असे. गजा मालक म्हणून तो राहत असलेला घराचा भाग जरा ऐसपैस होता. वास्तविक गल्लीतल्या कुठल्याच घराला (आमच्याही) वास्तू कलेचे नियमबद्ध आराखडे नव्हतेच त्यावेळी. कुठेही कशाही लांब अरुंद खोल्या एकमेकांना जोडल्या की झाले घर. पण अशा घरातही अनेकांची जीवने फुलली हे महत्त्वाचे.
गजाच्या घरात त्याची आई आणि त्याच्या लांबच्या नात्यातील बहिण “शकू” राहायचे आणि येऊन जाऊन बरीच माणसं असायची तिथे. कधी कधी गजाचे वडीलही दिसायचे मात्र गजा आणि शकू या बहीण भावांच्या नात्याबद्दल मात्र बऱ्याच गूढात्मक चर्चा घडायच्या.
गजाकडे आम्हा मुलांचं फारसं जाणं-येणं नव्हतं, पण गजाच्या शेजारी राहणाऱ्या दिघ्यांच्या कुटुंबातला आनंद आमच्यात खेळायला यायचा. आनंद, दिवाकर, अरुणा आणि त्याचे आई वडील असा त्यांचा परिवार होता.
आनंदची आई भयंकर तापट होती आणि सदैव कातावलेली असायची. त्यामुळे आम्ही आनंदच्या घरी खेळायला कधीच जात नसू पण आनंद मात्र आमच्यात यायचा. आम्ही त्याला आंद्या म्हणायचो. पुढे तोच “आंद्या” “आनंद दिघे” नाव घेऊन शिवसेनेचा एक प्रमुख नेता म्हणून नावारूपास आला ते वेगळं. पण माझ्या मनातला “आनंद” मात्र त्यापूर्वीचा आहे.
बालवयात आम्हा साऱ्या मुलांना फक्त खेळणं माहीत होतं. भविष्याची चिंताच नव्हती. पुढे जाऊन कोण काय करेल, कसे नाव गाजवेल याचा विचारही मनात नव्हता आणि “आनंद” अशा रीतीने लोकनेता वगैरे होण्याइतपत मजल गाठेल असे तर स्वप्नातही वाटले नाही कारण साध्या साध्या खेळात सुद्धा तोच प्रथम आऊट व्हायचा आणि आऊट झाल्यावर कोणाच्यातरी घराच्या पायरीवर गालावर हात ठेवून, पाय जुळवून पुढचा खेळ पहात बसायचा तेव्हा तो अगदी “गरीब बिच्चारा” भासायचा.
आज हे लेखन करत असताना खूप आठवणी उचंबळत आहेत. “आनंदची” खूप आठवण येत आहे. पुन्हा लहान होऊन त्याच्याशी संवाद साधावासा वाटतोय. तो आता या जगातही नाही. मनात दाटलेल्या भावना पत्रातूनच व्यक्त कराव्यात का ? कदाचित पत्र लिहिताना क्षणभर तरी त्याच्याशी बोलल्यासारखे वाटेल म्हणून.
प्रिय आनंद, स. न. वि. वि. खरं म्हणजे मला, तुला पत्र लिहिताना “सनविवि” वगैरे ठरलेले मायने नव्हते घालायचे. कारण त्यामुळे आपल्या मैत्रीच्या नात्यात उगीचच औपचारिकपणा जाणवतो. आपल्या मैत्रीत आपलं निरागस, आनंदी, खेळकर बाल्य अशा पारंपरिक शब्दांनी उगीचच बेचव होतं. आणि मला ते नको आहे. मी तुझा बायोपिक पाहिला. आवडला. तुझ्या भूमिकेतल्या त्या नटाने सुरेख अभिनयही केलाय. संहिता लेखन छान. तुझ्या राजकीय आणि सामाजिक जीवनावर वास्तववादी प्रकाश पाडलाय. पण चित्रपट बघताना मला मात्र, ’टेंभी नाका, धोबी गल्ली ठाणे’ इथला अर्ध्या, खाकी चड्डीतला, मळकट पांढर्या शर्टातला मितभाषी, काहीसा शेमळट, भित्रा, गरीब स्वभावाचा पण एक चांगल्या मनाचा आनंद नव्हे आंद्या आठवत होता. जो माझा बालमित्र होता. तो मात्र मला या चित्रपटात सापडला नाही. आणि मग माझं मलाच हंसू आलं अन् वाटलं तो कसा सापडेल ? इथे आहे तो एक जनमानसातला प्रमुख राजकीय नेता आणि माझ्या मनातला आनंद होता तो माझ्याबरोबर, विटीदांडु खेळणारा, गोट्या, डबा ऐसपैस, थप्पा, लगोरी खेळणारा आनंद.. आईची रागाने मारलेली हाक ऐकली की खेळ अर्धवट सोडून पटकन घाबरत, धावत घरी जाणारा आनंद. लहान भाऊ, बहिणीला सांभाळणारा आनंद. एकदा मी तुला विचारलं होतं “तू आईला इतका कां घाबरतोस ?” तू एव्हढंच म्हणाला होतास, “मला तिला आनंदी ठेवायचे आहे.. ” आनंद, तुझ्या नावात आनंद होता पण तू कुठेतरी अस्वस्थ, खिन्न होतास का ? लहानपणी कळत नव्हते रे या भावनांचे खेळ. एक साधं गणित मी तुला सोडवून दिलं होतं आणि तुझी खिल्लीही उडवली होती. “काय रे ! इतकं साधं गणित तुला जमलं नाही ? इतका कसा ढब्बु ?” तू वह्या पुस्तकं घेऊन फक्त निघून गेलास. पण नंतर तू किती मोठी राजकीय गणितं सोडविलीस रे.. पुढच्या काळात तुझ्याविषयीच्या पेपरात येणार्या बातम्या, फोटो. लोकप्रियता वाचून मी थक्क व्हायची. अरे ! हाच का तो आनंद ? मी कधी विश्वासच ठेऊ शकले नाही. मी माहेरी ठाण्याला असताना एक दोनदा तुला भेटलेही होते. पण तू घोळक्यात होता. माझा बालमित्र आनंद, तो हा नव्हता. वाईट वाटले मला. पेपरात जेव्हां तुझ्या निधनाची बातमी वाचली, उलट सुलट चर्चाही वाचल्या. एका राजकीय नेत्याचे ते निधन होते. पण माझ्यासाठी फक्त माझ्या बालमित्राचे या जगात नसणे होते हे तुला कसे कळावे आणि त्यासाठी माझ्या डोळ्यात अश्रू होते. चित्रपट बघून मी घरी आले. मैत्रीणीचा फोन आला. “कसा वाटला मुव्ही ?” “छानच” अग ! आनंद आमच्या धोबी गल्लीत आमच्या घरासमोर रहायचा… पण हे काही मी नाही सांगितले तिला. कारण आपलं वेगळं नातं मी मनात जपलंय. उगीच एका राजकीय नेत्याशी असलेल्या नात्याचं मला मुळीच भांडवल करायचं नव्हतं आणि नाही. माझ्यासाठी फक्त ढब्बु आंद्या. कसं असतं ना लहानपण ? मुक्तपणे एकमेकांशी भांडणे, वाट्टेल ती नावे ठेवणे, टिंगलटवाळी करणे आणि तरीही मैत्रीच्या नात्यात कधीही न येणारी बाधा.. म्हणून का ते रम्य बालपण ? पण आनंद मला मनापासून तुझा अभिमान आहे. तुझ्या बालवयातल्या प्रतिमेसकट.
तुझी बालमैत्रीण.
माझं पत्र वाचून तुला नक्की काय वाटेल याचा विचार करत असताना मला आताही “गजाची चाळ” आठवते. काही वर्षांपूर्वी बदललेल्या धोबी गल्लीत गेले होते तेव्हा “गजाच्या चाळीचा” चेहराच बदलला होता. त्या संपूर्ण इमारतीचं शिवसेनेच्या कार्यालयात रुपांतर झालं होतं. त्या कपाळावर गंध, दाढीधारी प्रतिमेत लपलेला आनंदचा चेहरा मी शोधत राहिले…
☆ मी घर आवरत्येय… मोकळी होत्येय की गुंतत्येय !!!!!☆ डॉ. माधुरी जोशी☆
अखेर सह्या झाल्या. बिल्डिंग री डेव्हलपमेंटला गेल्याचं शिक्कामोर्तब झालं…. थोडा अवधी होता हातात… नवीन जागा मिळण्याचा भविष्यातला आनंद खुणावत होता…. आणि या भिंती मधला सारा भूतकाळ सतत सामोरा येत होता… आता चमचा नॅपकिन्स पासून कागदपत्रांपर्यंत किती आणि काय काय आवरायचं होतं. मनात ही वास्तू, आणि काही वस्तू सोडून जायची हलकीशी वेदना होती… पण घर आवरायलाच हवं होतं आणि खरं म्हणजे मनही!!! कामाला लागले आणि लक्षात यायला लागलं आवरणं कमी होतंय आणि आठवणींच्या साम्राज्यात गुंतणंच वाढतंय…
किती खोलवर रुजलेल्या, रुतलेल्या स्मृती.. एकेक आठवणींचं गाठोडं…. समोर आलेली फोटोंची पिशवी तर मनाला सगळ्यात जीवंत करणारी… सणवार, वाढदिवस, लग्नकार्य, ट्रीप्स, बक्षिस समारंभ, ट्रॉफ्या, एअरपोर्टवर मुलांना शिक्षणासाठी जातांना भरल्या डोळ्यांनी हासत दिलेले निरोप, दृष्टी आड, काळाच्या पडद्याआड झालेले वडीलधारे, कुणी सोबती, कुणी अगदी क्वचित भेटलेले तरी जवळचे, वाड्यातले, किती किती आठवणी…
तर काही कागदावर पेनानं उमटलेली अक्षरं, मनातल्या विचारांना सजवणारी… सुख दुःखाची, यशापयशाची, मन मोकळं करणारी…. कधी वर्तमानपत्रांनी दाद देऊन छापलेली, काही कविता, कार्यक्रमाची निवेदनं, त्यावरंच कुठल्याशा कोपऱ्यात लिहीलेले पत्ते, फोन नंबर्स…. चाललं मन गुंतत….
आणि अभ्यास, नोट्स, नोंदी, फेअर वर्क…. माझं संगीतातलं, मुलांचं इंजिनिअरिंगचं, यांचं गड किल्ल्यांचं… सुटत चाललेले, पिवळे पडलेले, क्वचित तुकडे पडणारे…. किती किती जुने कागद…. खूप दिवसात सापडंत नव्हतं ‘ ते ‘ पुस्तक…. कशात तरी दडलेलं. आनंदाच्या भरात तेच चाळलं… गुंतलं वेडं मन… अचानक सामोऱ्या येणाऱ्या जुन्या पावत्या… बिलं…. जगण्यातला इतक्या वर्षांचा आर्थिक आलेख मांडणाऱे… फोडायचंच राहिलेलं एखादं आहेराचं पाकिट आणि अमक्याकडून केंव्हातरी आलेला पण आज मिळालेला आहेर… आपलेच पैसे परत छुपा आनंद देणारे… मग ते पाकिट देणाऱ्यांच्या आठवणी… एखादी कपड्याखाली जपून ठेवलेली अन् आता चलनातंच नसलेली नोट…. चाललं… चाललं मन हिंडायला…. गंमत म्हणजे हे सारं आपल्या जागी होतंचकी.. निवांत, शांत पहुडलेलं…. या इथून निघण्यानी ते निघालं जागेवरून…. मोकळा श्वास घेतला कागदांनी…. स्मृती वगैरेंचे कागद परत आत गेले पाऊचमधे आणि सटरफटर गेले केराच्या टोपलीत… किती पसारा, , किती कागद, , किती काय जपलेलं, चुकून राहिलेलं, उगीच सांभाळलेलं…. आवरलं ते सगळं खरं पण मन मात्र आठवणींच्या गुंत्यात गुंतलेलं राहिलं….
इथून निघेपर्यंत स्वयंपाकघरात जेवणखाण बनणार होतं… ते शेवटी आवरू असं ठरवलं खरं…
पण रोज लागणाऱ्या भांड्यांपेक्षा किती तरी जास्त काही भांडी होतीच…. अनेक वर्ष जमवलेली. भांडी…. २५ लोक आले तरी घरात तयार असणारी वेळोवेळी घेऊन जमवलेली, हौसेची, आवडीची, मुलांची मुद्दाम नावं घालून घेतलेली, तर काही आहेरात आलेली, नावं नसलेली पण पदार्थ घालून शेजारपाजारची आलेली कन्फ्यूज्ड भांडी, मी जपून ठेवून मालक शोधणारी, काही तर बॉक्स मधूनही न निघालेली… कप, मग्ज्, न लागणाऱ्या बशा, दह्या दुधाचे सट, गंज, कल्हई लावलेली पितळी पातेली… लोखंडी तवे कढया पळ्या…. बापरे…. ४६ वर्षांचा पसारा…. सासुबाईंच्या वजनदार पितळी, स्टीलच्या भांड्यापासून अगदी निर्लेप तरीही हवाहवासा…. प्राणपणानी जपलेला, वाढवलेला पसारा… सारं सोबत होतं इतकी वर्षं….
पण आता मन आवरायला हवं होतं… मोजकं, गरजेचं, चांगलं, ठेवून मोकळं व्हायचं होतं… आणि मग भांडी निवडली…. गुंतलेल्या माझ्याच मनाविरुद्ध जणू लढंत राहिले….
मग असेच नातवंडांचे खेळ, कपडे, अगदी बॉक्स सुद्धा न उघडलेल्या गिफ्टस्,…. सगळं काढतांना मन अस्थिर… टाकणाऱ्या हाताला परत मागे खेचणारं… कधी आठवणींची कासाविशी कधी दुर्लक्ष झाल्याचा अपराधीपणा….
आवरणं कसलं…. मनाचं धावणं चारही दिशांना…. भूतकाळात.. कसं आवरायचं? आठवणींच्या गुंत्यातून कसं अलगद, न दुखावता सोडवायचं?यातलं काय ठेवावं? काय टाकावं? आता कुणाला दाखवायच्या आहेत त्या ट्रॉफ्या, सर्टीफिकेट्स, पत्र, लेख….. मुलं तर सगळ्यातून दूर… १००% प्रॅक्टीकल सल्ला देणारी…. नवीन पिढीच अशी… न गुंतणारी… स्पष्ट…..
आम्ही फार गुंतलोय का ? फारच भावनिक आहोत का?चुकलं का?
नाही नाही…. मन कबूल होत नाही…. कारण आम्ही आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर क्षण अन् क्षण जगलो…. जे, जसं, जेंव्हा, जेवढं मिळालं त्यात आनंदात राहिलो. म्हणून तर पुढे श्रीमंत सिल्क नेसलो तरी आईच्या मायेचा चिटातला फुलांचा फ्रॉक, खणाचं परकर पोलकं आजही मनाजवळ आहे…. मुलांच्या घरात बॉयलर आले तरी तांब्याच्या लालभडक बंबाच्या ठिणग्या आणि पत्र्याच्या बादलीतल्या वाफाळत्या पाण्याची ऊब सोबत आहे… मिक्सर आले तरी पाटावरवंट्याचं खसखशीत वाटंण चवीत आहे…. वस्तू नाहीत पण आठवणी घट्ट आहेत…. मन गुंतून राहिलंय आजवर…
बरं या आठवणींचं तरी असं आहे…. आज फ्रीज जवळ गेलं की क्षणात विसरायला होतं काय घ्यायला आलो होतो ते… पण त्याच मनात ५वी, ६वी मधल्या नाना वाड्यातल्या शाळेत काव्य गायनासाठी गायलेल्या कविता लख्खं स्मरणात आहेत. किती उतारे, नाटकातले संवाद, समुहगीतं, अभंग, भावगीतं बंदिशी, तराणे…. मग शिक्षिकेची नोकरी करतांना मुलींचं यश, ते आलेले नंबर, त्या घोषणा…… हे सगळं आठवणीत आहे कारण सारं मन लावून, जीव ओतून केलंय. आज हे फोटो, सर्टिफिकेट्स पुन्हा ४० /५० वर्ष मागे नेतात ते त्या जिव्हाळ्यामुळे…
तेच स्वैपाकात.. प्रेमानं, मायेनं खाऊ घालण्याच्या भावनेत आहे. मग ती लोखंडी, पितळी, जाडजूड स्टीलची जुनी भांडी पण मऊ स्पर्श देतात. केवढी सेवा दिली त्यांनी…. ती टाकायची, नाकारायची कशी? ते कागद, पत्रं फोटो, ती पत्र, सर्टीफिकेट्स, भांडी, कपडे साऱ्यांनी तर सोहळा केला जगण्याचा…. पण मग मी मनाची समजूत घालते…. परत परत चाळण लावते…. मोजकं ठेवते…. काही दूर सारते… डोळे भरून पाहून घेते. तासाभरात आवरुया असं ठरवते सकाळी आणि दिवस कलायला येतो तरी मी त्याच पसाऱ्यात असते. पत्रं, भांडी, फोटो, पावत्या, पुस्तकं, कपडे सगळं सगळ्यांकडे आहेच…. एक गोड पसारा आयुष्यभर मांडलेला…
… सगळ्यांचं असंच होतं असेल का?आवरायला काढलं खरं…
पण किती प्रसंग, विषय, घटना, आनंद, दु:ख, यश अपयश… कुठेकुठे मन हिंडून येतं… हिंडवून आणतं….
पण भावनिक मनाला प्रॅक्टिकल मन समजावतं…. आवरायला लावतं सामान आणि भावना !!! तरी भावनिक मन चोरून याच्या नकळत काही पिशवीत भरतंच…………… आवरण्यातली ही गुंतवणूक !!
☆ सरणावर टाकलेलं चारित्र्य… श्री मयुरेश उमाकांत डंके ☆ प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनावणे ☆
सोमवार संध्याकाळची वेळ होती. पुण्यात पाऊस अगदी व्यवस्थित प्रामाणिकपणे त्याचं कर्तव्य बजावत होता. एक पालक भेटायला येणार होते, पण अजून पोचले नव्हते. मी टेबलाशी बसून स्व. डॉ. स्नेहलता देशमुख यांचं “अरे संस्कार संस्कार” वाचत होतो. तितक्यात माझी पत्नी आतून बाहेर आली आणि काहीही न बोलता तिनं तिच्या स्मार्टफोन वर एक व्हिडिओ मला दाखवला. तरुणांनी खांद्यावर उचलून घेतलेला एक तरुण. मिशा नाहीत अन् दाढी राखलेला. गळ्यात बांगलादेश चा राष्ट्रध्वज आणि दोन्हीं हातात स्त्रीची अंतर्वस्त्रे एखाद्या विजयी वीरासारखी तो नाचवत होता.. !
तो व्हिडिओ मेंदूऐवजी आधी मनातच घुसला. काही क्षण तर आपण नेमकं काय पाहतो आहोत, हे समजून घेण्यातच गेले. तो व्हिडिओ मी आठ दहा वेळा वारंवार पाहत राहिलो. जल्लोष करणाऱ्या त्या तरुणाच्या चेहऱ्यावरचे भाव वाचण्याचा प्रयत्न करत राहिलो.
साधारण पंचविशीचा किंवा त्याहूनही लहान वयाचा तो तरुण असेल. ७६ वर्षं वयाच्या आपल्या देशाच्या महिला पंतप्रधानांच्या घरी घुसतो, घरात नासधूस करतो, महिला पंतप्रधानांच्या कपड्यांचं कपाट उचकतो आणि त्यातून त्यांची अंतर्वस्त्रं काढून घेऊन ती अत्यंत उन्मादानं कॅमेऱ्यासमोर नाचवतो.. ! तो व्हिडिओ पाहताना एका बाजूला लाज वाटत होती, दुःख होत होतं अन् दुसऱ्या बाजूला विलक्षण संताप होत होता.
त्याच लिंकवर आणखी फोटो दिसायला लागले. काही तरुण अत्यंत आनंदानं पंतप्रधानांच्या साड्या गुंडाळून फिरत होते, त्यांचें ब्लाऊजेस दाखवत होते.. ! विशेष म्हणजे, यात बांगलादेशी तरुणीदेखील सहभागी होत्या आणि स्वतः स्त्री असूनही त्यांना ह्या कृत्याची किंचितही लाज वाटली नाही आणि त्यात काही गैर आहे असंही वाटलं नाही.. !
बांगलादेशातली राजकीय धुमश्चक्री मीही इंटरनेटवरुन पाहत होतो, माहिती घेत होतो. भारत-बांगलादेशचं निर्यात धोरण आता धोक्याच्या वळणावर आहे, हे सरळ सरळ दिसत होतं. बांगलादेशातली उद्योगव्यवस्था आणि साहजिकच अर्थव्यवस्था या दोन्हींचा बोजवारा उडाला तर येत्या काळात दयनीय अवस्था निर्माण होणार आणि बांगलादेशातले अल्पसंख्य नागरिक त्यांचं चंबूगबाळं उचलून, बायका-पोरं काखोटीला मारुन जगभर निर्वासित म्हणून फिरणार, हे सगळं कळत होतं. बांगलादेशातले एक कोटी हिंदू रहिवासी नागरिक आता काय करतील, हा प्रश्न गेल्या काही दिवसांत हजारदा मनात येऊन गेला असेल.. !
पण हे फोटो पाहिले, व्हिडिओ पाहिले आणि जाणवलं की, या अल्पसंख्य हिंदूंमधल्या स्त्रिया अन् मुलींचं काय होईल ? “जीव वाचवायचा असेल तर शीलाला तिलांजली द्या” असा प्रकार सुरु झाला तर मुळीच आश्चर्य वाटणार नाही, अशी सामाजिक परिस्थिती तिथं नग्नसत्य बनून उभी आहे.. ! सच्चिदानंद शेवडे गुरुजींचं “रक्तलांच्छन” हे पुस्तक तरुणांनी तर वाचावंच, पण त्याहीपेक्षा पालकांनीच वाचणं अधिक गरजेचं झालं आहे.
राजकीय आंदोलनाला एखाद्याची चिथावणी असू शकते, पाठिंबा असू शकतो, कट-कारस्थानं असू शकतात, हे सगळं मान्य. देशाच्या प्रधानमंत्र्यांच्या निवासस्थानी जाणं आणि तिथं धुडगूस घालणं, फर्निचर पळवून नेणं हे खरोखर चुकीचं असलं तरीही त्या वागण्याला अख्ख्या जगात “जनक्षोभ” असं गोड नाव दिलेलं असल्यामुळे त्यातला सामाजिक गुन्हा आता जवळपास नामशेष झाला आहे.
पण देशातल्या तरुणांनी आंदोलन किंवा जनक्षोभाच्या नावाखाली महिला पंतप्रधानांच्या अंतर्वस्त्रांची माध्यमांसमोर जाहीर बीभत्स विटंबना करणं, हे आता काहीतरी भलतंच सांगू पाहतंय.. ! ह्या तरुणांच्या आयांना, बहिणींना, आत्यांना, मावश्यांना, माम्यांना हे फोटो बघून काय वाटलं असेल हो ? धर्म कुठलाही असो, पण स्त्री चारित्र्याची अशा पद्धतीनं जाहीर वासलात लावणं, हे आधुनिक जगाच्या कुठल्या जीवनशैलीत बसणारं आहे ?
आपल्या देशात हे घडलं असतं आणि अशा तरुणांवर गुन्हा दाखल झाला असता तर काय झालं असतं ? सगळ्यात पहिलं म्हणजे, घटना घडल्यानंतर चार पाच दिवसांनी माध्यमांनी या तरुणांना नराधम वगैरे म्हटलं असतं, दिवसरात्र महाचर्चांची गुऱ्हाळं चालवली गेली असती, शे दोनशे सामाजिक विचारवंत, कलावंत, लेखक, साहित्यिक यांनी सह्यांची मोहीम केली असती आणि आठ दहा नामांकित वकिलांची फौज उभी केली असती. दुसरी एखादी याहून सनसनाटी घटना घडेपर्यंत मीडियाचा तोफखाना सुरु राहिला असता. पंधरा दिवसांनी समाजच हा विषय विसरुन गेला असता. आजवर हे असंच घडत आलेलं आहे. पण आता जनक्षोभाचा नवा पैलू अवतार घेतो आहे.. ! राजकीय किंवा सामाजिक विरोधातून सुरु झालेलं वैमनस्य आता नैतिकतेला अन् महिलांच्या चारित्र्यालासुध्दा पायदळी तुडवत सुटलं आहे.
“पद्धतशीर विसंवेदन” नावाचं एक मानसशास्त्रीय तंत्र आहे. माणसांना भावनिकदृष्ट्या बोथट किंवा संवेदनाशून्य कसं केलं जातं, याचं हे एक प्रमुख तंत्र आहे. ते वैयक्तिक आयुष्यापासून ते समाज, देश, राष्ट्र अशा सगळ्या पातळ्यांवर उपयोगात आणलं जातं. समाजात सर्वदूर सगळीकडे अनैतिक घटनांचा असा महापूर आणायचा की, लोकांच्या त्याविषयीच्या भावना, संवेदना तेच तेच पाहून, ऐकून, वाचून पार बोथट होत जातात. “आता नैतिकता आणि चारित्र्यापेक्षा आमची भावना महत्त्वाची” याच मार्गावर चालण्याचा पायंडा पाडला गेला तर आश्चर्य वाटायला नको.
महाराष्ट्रात तर याची सुरुवात केव्हाच झाली आहे आणि महाराष्ट्रातल्या जनतेनं ते आनंदानं स्वीकारलं आहे. मराठी “कॉमेडी शो” ने या प्रकरणाचा शुभारंभ केव्हांच केला आहे. विनोदाच्या नावाखाली पुरुषांनी स्त्री भूमिका करणे हा तर उघड स्वैराचार चालला होता. “ह्याला विनोद म्हणा” असा आग्रह जर शरद तळवलकर, राजा परांजपे, राजा गोसावी, अशा लोकांच्यासमोर धरला असता तर ही माणसं झीट येऊनच पडली असती. समीर चौगुले नामक माणूस विनोद निर्मितीच्या नावाखाली काय काय आचरट चाळे करतो, हे इथे नव्यानं सांगायला नको. पुरुष कर्मचाऱ्याने ऑफिसात परकर परिधान करून जाणे, स्त्री ला जाहीर मुलाखतीत “पावसाळ्यात चड्डी कशी वाळवता” असा प्रश्न विचारणे, असले अनंत आंबट चाळे या माणसाने विनोद या नावाखाली महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचवले आहेत. त्याची साथ द्यायला बाकीचे तथाकथित कलावंत आहेतच. विनोदाच्या नावाखाली गौरव मोरे “थंडीत तुझी कोळंबी होते” असं म्हणतो, मराठी माणसांना तो विनोद वाटतो. वनिता खरात आणि समीर चौगुले विनोदाच्या नावाखाली एकमेकांना छातीवर धडकतात, त्याचा प्राजक्ता माळी आणि प्रसाद ओक वन्स मोअर देतात, मराठी माणसांना तो विनोद वाटतो. एका स्टॅण्डअप कॉमेडी शो मध्ये अंकिता वालावलकर ” रात्रीच्या वेळी सुनसान रस्त्यावर बॉयफ्रेंड अचानक कार थांबवून रस्त्यात उतरला आणि मूत्र विसर्जन करु लागला. “मी प्रकाशात पाहिलं तेव्हा कळलं की केवळ ह्याचा मेंदूच छोटा नाहीय” असं म्हणते, मराठी माणसांना तो विनोद वाटतो… !
आता ‘विनोद असेच असतात’ असा मराठी माणसांचा ठाम समज झाला असेल तर ते स्वाभाविकच आहे. कारण, विनोदाच्या नावाखाली वारंवार त्याचाच मारा करण्यात येतो आहे. समाजमन उथळ आणि आंबट होण्यात या असल्या प्रकरणांचा खारीचा नाही तर सिंहाचा वाटा आहे, हे आपणच लक्षात घेण्याची गरज आहे.
एकही स्त्रीवादी साहित्यिक, कलावंत, सामाजिक कार्यकर्ता, विचारवंत या प्रकरणाचा निषेधही करत नाही आणि तक्रारही करत नाही, हे तर त्याहून जास्त धक्कादायक आहे. मग आपण नेमकी कोणती संस्कृती जन्माला घालतो आहोत, ह्याचा विचार कुणी करायचा?
“सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जे करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे, अधिष्ठान पाहिजे” असे समर्थांनी म्हटलेलं आहे. ते आपण नेमक्या कोणत्या बासनात गुंडाळून ठेवलेलं आहे? आणि कशासाठी?
आज बांगलादेशातल्या तरुण आंदोलकांनी चारित्र्याच्या बाबतीत जी नीच पातळी गाठली आहे, तिचं लोण जगभर पसरणार नाही, ह्याची कुणाला खात्री आहे? राजकीय मतभेद, वैचारिक मतभेद अगदी अवश्य असू शकतात, पण ते महिलांच्या चारित्र्याची विटंबना करण्यापर्यंत यावेत, हा अध्याय गंभीर आहे. केतकी चितळे ला महाराष्ट्रात ज्या भाषेत ट्रोल केलं गेेलं आहे, त्यात हे नैतिकतेचं पारडं पार गंजून खलास होण्याच्या मार्गावर असल्याचं दिसलेलं आहे.
समाजातल्या तरुण वर्गाचा राजकीय स्वार्थासाठी उपयोग करून घेण्याचा घाणेरडा डाव महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यातही गेल्या पंचवीस वर्षांपासून सुरु आहे. त्या धगीचे चटके बसत असतानाच हे सांस्कृतिक प्रदूषणाचं वारं आणखी भर घालत सुटलं आहे, हे काळजीचंच लक्षण आहे.
कुटुंबांचा आपल्या घरातल्या तरुणांवर असलेला प्रभाव नष्ट होत चालला आहे का, असा शोध घ्यायला भरपूर वाव आहे. आपली मुलं मोठी झाली, वयात आली, त्यांना आपण स्वातंत्र्य दिलं, हे सगळं खरं. पण त्यांच्या वैचारिक संतुलनाचं काय, असा प्रश्न आता पालकांना स्पष्टपणे विचारण्याची वेळ आली आहे. आपली मुलं कुठं जातात, काय करतात, कुणासोबत फिरतात, कुणाच्या सहवासात असतात, त्यांची सामाजिक प्रतिमा कशी आहे, या सगळ्यांची जबाबदारी नेमकी कुणाची आहे ? आपली मुलं स्मार्टफोनचा, इंटरनेटचा नेमका कशासाठी उपयोग करतात, हे पालकांना माहित असायला नको का ? आता या प्रश्नांची उत्तरं समाजानं सगळ्या पालकवर्गाला विचारायला हवीत. तरुणांच्या स्वातंत्र्याला, अभिव्यक्तिला, ऊर्जेला नैतिकतेची, विवेकाची आणि तारतम्याची भक्कम चौकट असणं ही केवळ आपलीच नव्हे तर संपूर्ण जगाची गरज आहे. कुटुंबव्यवस्थेनं तरुण वर्गाला स्वैराचारापासून थांबवलं नाही तर, आज बांगलादेशातले फोटो दिसतायत, उद्या आपलीही मुलं त्याच गोष्टी करताना दिसली तर, त्या पापाला कुठल्याच प्रायश्चित्ताचा काहीही उपयोग नसेल…!
आपल्या भावना योग्य प्रकारे आणि सामाजिक- सांस्कृतिक- नैतिक चौकटीत राहूनच व्यक्त करणं, भावनांवर योग्य पद्धतीनं नियंत्रण मिळवणं आणि स्वतःला इतरांच्या स्वार्थाचा बळी होऊ न देणं ही कौशल्यं केवळ भारतातल्याच नव्हे तर जगभरातल्या तरुण पिढीला अवगत असणं अत्यंत आवश्यक आहे. नाही तर या सगळ्याचे फार भीषण परिणाम सगळ्यांना भोगावे लागण्याचा दिवस आता फार काही दूर असेल असं वाटत नाही.. !
(पूर्ण अंध असूनही अतिशय उत्साही. साहित्य लेखन तिच्या सांगण्यावरून लिखीत स्वरूपात सौ.अंजली गोखले यांनी ई-अभिव्यक्ती साठी सादर केले आहे.)
☆
हे भगवंता मला तुझ्या मंदिराच्या दारासमोरचा धुरळा बनव
म्हणजे तुझ्या एका कृपा कटाक्षाने मी पवित्र होऊन जाईन. I
*
हे भगवंता मला तुझ्या मंदिराच्या पायाचा दगड बनव
म्हणजे तुझ्याकडे येणाऱ्या भक्तांच्या पदस्पर्शाने माझा अहंकार गळून पडेल. I
*
हे भगवंता मला तुझ्या मंदिराचा उंबरा बनव.
म्हणजे भक्ति मला ओलांडून आत प्रवेश करेल. I
*
भगवंता मला तुझ्या मंदिरातील घंटा बनव.
म्हणजे मंजूळ अशा घंटानादाने मला तुझी ओढ लागेल ।
*
हे भगवंता मला तुझ्या मंदिरातील समोर असलेले कासव बनव
म्हणजे भक्त जेव्हा त्यावर डोकं टेकतील
तेव्हा त्यांच्यातील श्रध्देमुळे माझे मन निर्मळ बनेल ।
*
भगवंता मला तुझ्या गाभार्यातील समई बनव
म्हणजे मंद प्रकाशात सारा अंधकार उजळून निघेल ।
*
हे भगवंता मला तुझ्या पायातील छुम छुम वाजणारे पैंजण बनव
म्हणजे मी तुझ्या चरणांशी नेहमीच बांधलेली राहीन ।
*
हे भगवंता मला तुझ्या गळ्यातील तुळशीचा हार बनव
म्हणजे मला तुझ्या नित्य सहवासाचा परमानंद मिळेल |
*
हे भगवंता मला तुझ्या कानातील कुंडले बनव
म्हणजे भक्त जेव्हा तुझी स्तुती करतील ती मला जवळून ऐकता येईल. I
*
हे भगवंता मला तुझ्या ओठावरील बासरी बनव
म्हणजे तुझ्या हदयातून आलेले सूर मला स्पर्शून बाहेर पडतील. I
*
हे भगवंता मला तुझ्या मस्तकावरील किरीट बनव
म्हणजे मला सतत तुझ्या पदकमलांचे दर्शन होत राहील ।
*
हे भगवंता मला तुझ्या मदिरावरील कळसाचा ध्वज बनव.
म्हणजे मला शांती आणि प्रेमाचा संदेश जगाला देता येई ल ।
*
… आणि नाहीच काही यातलं तुला जमलं
तर निदान तुझ्या मंदिराच्या दारात बाजूला असलेल्या
पारिजातकाच्या झाडावरून खाली पडलेलं
नाजूकसं केशरी दांड्याचे फूल बनव
… म्हणजे मला तुझ्या भक्तिचा सुगंध आसमंतात दरवळवता येईल.
☆
(मला आवर्जून एक प्रश्न पडतो की… ‘ही इतकी भावपूर्ण आणि सुंदर प्रार्थना करणारी लेखिका/कवयित्री शिल्पा… हिला दृष्टिहीन कसे म्हणायचे ?‘ … तिच्या भावना… तिचेच शब्द फक्त कागदावर उतरवणारी मी… – अंजली दिलीप गोखले.)
☆ गळून पडलेली फुलं – लेखक : अज्ञात – संकलक : प्रा. माधव सावळे ☆ प्रस्तुती – सौ.अस्मिता इनामदार ☆
चालणे ही एक सामान्य क्रिया आहे. पण चालण्याचं सौंदर्य हे आहे की आपल्या आजूबाजूला घडत असलेले जीवन पाहता येते.
मी रोज सकाळी फिरायला जातो, तेव्हा मला एक वृद्ध गृहस्थ झाडाखाली पडलेली फुले उचलून मंदिरात दर्शनासाठी टोपलीत ठेवताना दिसतात. त्यांचा हा उपक्रम माझ्यात कुतूहल निर्माण करत होता.
एका सकाळी, मी त्यांना पुन्हा तेच करताना पाहिले आणि मी माझी उत्सुकता शांत करण्याचा निर्णय घेतला. मी त्यांना गळून पडलेल्या फुलांच्या ध्यासाबद्दल विचारले की इतर वृद्ध लोक तर ताजी फुले तोडतात.
मी त्याला विचारले, “सर, मी तुम्हाला नेहमी जमिनीवरून ही ताजी पडलेली फुले उचलताना पाहतो. तुम्ही त्यांचे काय करता?”
“मी ही फुले माझ्या पूजेच्या खोलीत देवतांच्या चरणी अर्पण करतो, ” त्याने अतिशय शांतपणे उत्तर दिले.
मी पहिल्यांदाच असं काही ऐकलं होतं. म्हणून, मी त्याला पुन्हा विचारले, “तुमची काही हरकत नसेल, तर मी तुम्हांला विचारू का की, झाडावर सहज तोडता येणारी फुले असताना तूम्ही ही पडलेली फुले देवाला का अर्पण करता ?”
त्याच्या उत्तराने मी थक्क झालो, “मी फुलांना त्यांचा उद्देश पूर्ण करण्यास मदत करतो – त्यांच्या शेवटच्या दिवसात देवासोबत राहण्याचा. त्यांनाही जीवन आहे; आमच्याप्रमाणे त्यांनाही त्यांच्या शेवटच्या दिवसात देवासोबत राहायचे आहे, नाही का? ” त्याने मला विचारले. मी सहमती दर्शविली.
मग तो म्हणाला, “काही लोक ज्या कळ्या अजून फुलल्या नाहीत अशा कळ्या खुडतात आणि काही फक्त नुकत्याच फुललेल्या कळ्या काढतात, त्यांना त्यांचा सुगंधही सोडू देत नाहीत किंवा त्यांचे जीवन जगू देत नाहीत. प्रत्येकजण जे सुंदर आहे ते ओरबाडतो आणि त्यातून वनस्पतीचे सौंदर्य काढून घेतो. मग पहा, ही झाडे कशी दिसतात – रंगहीन आणि निर्जन. “
तो पुढे म्हणाला, “प्रत्येक फुलाचा एक उद्देश असतो, देवासोबत राहण्याचा. प्रत्येकजण झाडांवर असलेली फुले घेतो, पण मी ती निवडत नाही. ती गळून पडणे हा फुलांचा दोष नाही. या म्हातारपणात मी कुणालाही साथ देऊ शकत नाही, पण किमान या फुलांना त्यांचे ध्येय साध्य करण्यासाठी मदत करू शकतो. “
मी फक्त होकार दिला, हसलो त्यांना शुभेच्छा दिल्या आणि चालू लागलो. मी चालत होतो तेव्हा माझे मन धावत होते. या नव्या प्रेरणेने आणि कल्पनेने मी निश्चय केला की यापुढे पूजेसाठी फक्त पडलेली फुले गोळा करावयाची.
दुसऱ्या दिवशी सकाळी फिरण्यासाठी गेलो असता एका झाडाखाली पडलेली फुलं मी फुलं उचलून तळहातावर ठेवली. फुले तळहातावर फुले ठेवताच, मला अंगावर रोमांच आले आणि माझे हृदय धडधडू लागले. माझ्या शरीरासाठी या फुलांबद्दल मला वाटणारा तो एक वेगळाच अनुभव होता. मी ती फुले घरी आणली, धुऊन ती कुठे असावीत तिथे म्हणजे परमेश्वराच्या चरणी ठेवली!
हा संपूर्ण अनुभव फक्त अप्रतिम होता. मला आतून खूप छान वाटलं. मला असे वाटले की मी कोणाचा तरी जीव वाचवला आहे किंवा एखाद्याला त्याच्या दुःखातून बाहेर येण्यास मदत केली आहे. फुलांचे असे समाधान मला यापूर्वी कधीच जाणवले नव्हते. आणि मला वाटते की मी असेच करत रहावं.
जे अकाली पडले आहेत त्यांना उचलून योग्य जागी ठेवा.
आयुष्यात आपल्याला नेहमी चांगल्या आणि सुंदर लोकांच्या आसपास राहायचे असते. आपल्या उंचीच्या लोकांबरोबर आपल्याला स्वतःला पहायचे असते आणि जे आपल्या उंचीच्या खाली आहेत, त्यांना आपल्यापेक्षा खाली बघायचे असते. पण, खरे समाधान तेव्हा मिळते जेव्हा आपण एखाद्याला मदत करतो, त्यांचे जीवन चांगले बनवतो आणि त्यांना आनंद आणि आनंद साजरा करण्यास मदत करतो. – मग तो माणूस, प्राणी, पक्षी किंवा इतर कोणत्याही प्रकारचे जीवन असो. मग फुले का नाहीत? जे पडले आहेत पदभ्रष्ट आहेत त्यांना उचला मार्गी लावा” आणि पहा तुम्हाला स्वतःला उंचावल्यासारखे वाटेल.
लेखक : अज्ञात
संकलन : प्रा. माधव सावळे
संग्रहिका – सौ अस्मिता इनामदार
पत्ता – युनिटी हाईटस, फ्लॅट नं १०२, हळदभवन जवळ, वखारभाग, सांगली – ४१६ ४१६
मोबा. – 9764773842
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
(शिक्षा सुनावल्यावर हे दोघे मोठ्याने घोषणा देत राहिले, ” वंदे मातरम जय श्रीराम भारतमाता कि जय”त्यांना ओढत शिपायाने बांधण्यासाठी नेले त्यांचे हात बांधून ठेवले आणि पाठीवरती वीस फटके मारायला सुरुवात केली.) – इथून पुढे —
कोवळी वीस वर्षाची पोरं त्यांच्या उघड्या पाठीवरती फटाफट फटकारे मारले जात होते वेदना होत होत्या पण ओठ दाताखाली दाबून ते घोषणा देत होते, ” वंदे मातरम भारत माता की जय” आणि हा जयघोष त्यांना वेदना सोसण्याचे बळ देत होता… शेवटी पाठीतून रक्त यायला लागले फटके देणारा खाली बसला संध्याकाळी पाच वाजता त्या दोघांना खाली उतरवण्यात आले हात खाली करता येत नव्हते कारण काखेत गोळे आलेले होते चार दिवस त्यांना पडून राहावे लागले वेदनाने जीव कळवळत होता पण चेहऱ्यावर ते दाखवत नव्हते त्यांना आनंद या गोष्टीचा होता की आमचा सण पाडवा वर्षाची सुरुवात आम्ही साजरी केली आणि इंग्रजांना एक प्रकारचा शह दिला
ही गोष्ट सांगताना मी अनेक गोष्टी त्यांना समजून सांगत होते.. की या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अशा छोट्या छोट्या व्यक्तींनीही खूप काम केले आहे श्रीखंड खाऊन दाखवणे हा त्यांच्या त्या वयातला इंग्रजांच्या विरुद्ध करावयाचा कट होता त्या सत्तेला त्यांना डिवचायचे होते पण त्याची त्यांना खूप मोठी किंमत मोजावी लागली पण देशासाठी ती आनंदाने त्यांनी मोजली
हे सर्व कथन करत असताना मुलीही गंभीर झाल्या होत्या माझे डोळे पाणावले होते मी मुलींना शेवटी एवढेच म्हणाले मुलींनो इतक्या अनेक गोष्टींनी ज्यांनी त्याग केला आहे त्यामुळे आपल्याला हे स्वातंत्र्य आज उपभोक्ता येत आहे आपल्याला आपल्या देशाचा अभिमान वाटला पाहिजे की आपल्या देशातली तरुणाई स्वातंत्र्य मिळावे म्हणून किती झटली आहे आपण फक्त 15 ऑगस्ट 26 जानेवारीला येऊन त्यांचे स्मरण करतो आणि झेंड्याला मानवंदना देताना त्यांच्या प्रती ही कृतज्ञता व्यक्त करत असतो म्हणून त्या दिवशी सर्वांनी हजर व्हायचे असते अर्थात ज्याना या घटनेशी काही देणंघेणं नाही ती मंडळी ती सुट्टी एन्जॉय करतात हे दुर्दैव आहे आणि मुलींनो तुम्ही तरी सगळ्या हुशार मुलींचा वर्ग डिस्टिंक्शन मध्ये येणारा वर्ग… तुमच्यापुढे अभ्यासाव्यतिरिक्त काही दिसत नाही त्यामुळे तुम्हाला 15 ऑगस्ट ला उपस्थित राहण्याची गरज वाटत नाही कारण देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्या अनेक लोकांबरोबर हे चार तरुण जे होते त्यात दोन तरुणातला एक माझा “बाप” होता भगवान मुकुंद पत्की आणि दुसरे होते माझे काका मोहोळचे डॉक्टर श्रीनिवास जोशी! त्यात तुमचे वडिल नव्हते या दोन तरुणांनी हे भोगलं होतं तुम्हाला त्याच्याशी काय देणं घेणं? तेव्हा तुम्ही उद्याला येण्याची काहीच गरज वाटत नाही. स्वातंत्र्य दिनाचे नातं माझ्याशी आहे मला त्याची जाण आहे माझ्या वडिलांनी सोसलेल्या हाल अपेष्टा मला ठाऊक आहेत मुलींनो झेंडा जेव्हा वर जातो ना तेव्हा माझे डोळे भरून येतात उर अभिमानाने भरून येतो आणि वाटतं की हा झेंडा फडकवण्याच भाग्य आपल्याला लाभतंय त्याचं कारण अनेकांचा त्याग आणि त्या त्यागामध्ये ज्या व्यक्तीचा सहभाग आहे अशा व्यक्तीची मी मुलगी आहे याचा मला अभिमान वाटतो…. तुम्हाला तसं काही वाटण्याचं कारण नाहीये तेव्हा कोणीही 15 ऑगस्टला उपस्थित राहावयाचे नाही आणि मी वर्गातून धाडकन निघून आले….. ! शेवटचे वाक्य बोलताना मी आवंढे गिळत होते माझे डोळे पाण्याने भरले होते मुली चिडीचूप होत्या त्यांचे डोळे ओलावले होते दुसऱ्या दिवशी आठवीच्या ओळीवर सगळ्या मुली हजर होत्या. वाचक हो हे लिहिताना आजही माझे डोळे भरून येतात मी वर्गातल्या एकाही मुलीशी बोलत नव्हते झेंडावंदन झाल्यावर सगळा वर्ग थांबला मॉनिटर ने मला आजची हजेरी घेतली आहे आणि ती मध्ये सर्व वर्ग हजर आहे असे सांगितले आणि आम्ही जे परवा वागलो त्याबद्दल आम्हाला क्षमा करा असे म्हणत मुली हात जोडून माझ्यासमोर उभ्या होत्या मी मॉनिटरला जवळ घेतल आणि म्हणाले, ” कशा ग तुम्ही अशा.. कस समजत नाही तुम्हाला… तुम्ही वेड्याही आहात आणि शहाण्या हि आहात.. माझे डोळे आनंदाने पाणावले होते माझा राग मावळला हे पाहून सर्वांनी टाळ्या वाजवल्या.. तो 15 ऑगस्ट चा दिवस मी कधीच विसरत नाही पुढे 14 साली आमचा माजी विद्यार्थिनी मेळावा झाला त्यात एका मुलीने उठून आठवण सांगितली बाई तुम्ही तुमच्या बाबांची आम्हाला गोष्ट सांगितली होती.. श्रीखंडाची… आजही मी आमच्या कॉलनीमध्ये झेंडावंदनाला उपस्थित राहणारी पहिली असते आणि मुंबई सारख्या ठिकाणी मी माझ्या मुलांना शाळेत पाठवते त्यांना झेंडावंदन चुकवू देत नाही त्यांनाही मी तुमच्या बाबांची गोष्ट सांगितली आहे हे म्हणजे रुजलेल्या संस्काराची परत पावती होती तरुण पिढीला हे सतत सांगायला हवे… सांगणारी माणसं कमी पडत आहेत.. म्हणून पुढच्या पिढीवर संस्कार कमी झाला आहे हे सगळं समजून सांगणारे भेटले तर आजही आपली येणारी पिढी नक्कीच सुजाण असेल देशभक्ती आणि देश प्रेम हे त्यांच्या नसानसात बिंबवलं पाहिजे सोनार बांगला लिहिणाऱ्या रवींद्रनाथ टागोरांच्या मूर्तीचा भंग हे ज्याने पाहिलं आणि बांगलादेशी च्या तरुणाचा नंगानाच ज्यांनी पाहिला त्या सर्वांना या गोष्टीची तीव्रतेने जाणीव होईल कि हे आपल्या मुलांनी असे करायला नको आहे राष्ट्रप्रेम आणि सुसंस्कार हे दोन्ही देण्याची गरज आहे राष्ट्र नुसते समृद्ध असून चालत नाही ते सुसंस्कारित पाहिजे आणि प्रत्येकाचे आपल्या राष्ट्रावर प्रेम पाहिजे… जय हिंद!!!
साधारणपणे ऑगस्ट महिन्याची 13-14 तारीख होती. शाळेमध्ये विद्यार्थिनीची 15 ऑगस्ट साठी विविध कार्यक्रमाकरिता तयारी करून घेण्यात येत होती. पि. टी. चे शिक्षक संचलनाची तयारी करत होते… नृत्य बसवणारे नृत्य बसवून घेत होते…
स्वराज्य सभेचे मंत्रिमंडळाच्या भाषणाची तयारी चालली होती… एकूण शाळेत विविध कार्यक्रमाची रेलचेल होती आणि त्याचा सराव चाललेला होता. बाकी मग ग्राउंड आखणे झेंडा व्यवस्थित आहे का पाहणे इत्यादी कामे लक्षपूर्वक केली जात होती. वर्गावरती सगळ्यांना नोटीसही गेली होती की 15 ऑगस्टला सकाळी सात वाजता सर्वांनी झेंडावंदनासाठी हजर राहावे. दुसरे दिवशी माझ्या वर्गातील म्हणजे मी ज्याचे क्लास टीचर होते.. आठवी अ.. त्या वर्गातील दोन-तीन मुली आल्या आणि म्हणाल्या,.. बाई बोलायचे थोडं.. मी म्हणाले, काय? त्या मुलाने सांगितले आपल्या वर्गातल्या सर्व मुलींनी 15 ऑगस्टला न येण्याचे ठरवले आहे कारण दुसऱ्या दिवशी पासून चाचणी परीक्षा सुरू आहे त्याच्या अभ्यासासाठी घरीच रहावे असे सर्वांचे ठरले आहे. मी म्हणलं “ठीक आहे असं काही होत नाही तू जा बाळा मी त्यांना समजावेन” त्या दिवशी सातवा तास मला ऑफ होता वर्गावर असलेल्या शिक्षकांकडून मी तास मागून घेतला आणि सातव्या तासाला वर्गावर गेले मुलींना वाटले बुलेटिन पिरेड आहे मी म्हणाले चला आज गणित घेणार नाहीये मी गोष्ट सांगणार आहे गोष्ट म्हणल्यावर सर्वांना आनंद मुलीने टाळ्या पिटल्या आणि मग एक गोष्ट सांगायला सुरुवात केली…
मुलींनो गोष्ट आहे खूप जुनी स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच्या कालावधीतली आपले अनेक क्रांतिकारक या स्वातंत्र्यासाठी लढा देत होते आणि त्यांना पकडून तुरुंगात डांबले जात असे त्यामध्ये 19/ 20 वर्षाची मुले होती त्यांना एका बरॅकित घातले होते म्हणजे एक आठ बाय आठ चा खोलीवजा तुरुंग. त्यामध्ये ही चार मुले राहत होती. जमावा मध्ये इंग्रजांन विरूद्ध भाषण केले म्हणून त्यांना पकडून आणलेले होते व शिक्षाही झालेली होती. येरवड्याच्या तुरुंगात ही सगळी मंडळी होती त्यामध्ये जागा नसल्यामुळे त्यांना बी क्लासमध्ये जागा दिली होती. त्या ठिकाणाच्या सुविधा जरा वेगळ्या असतात तिथे जरा वयस्कर नेते होते इन्कम टॅक्स भरणारे लोक होते आणि त्या ठिकाणी इतर कैद्यांना दररोज सकाळी गंजी देत असत म्हणजे पिठाची पेज त्या ऐवजी या बी क्लासमध्ये त्यांना दूध देत असत या चारी तरुणांनी ठरवले की आपल्याला जे दूध मिळते त्याचे आपण पाडव्या दिवशी श्रीखंड करून खाऊ पण या दुधाचे दही कसे लावायचे? तर त्यातील एक तरुण थोडा शिकलेला असल्यामुळे त्याला स्टोअर मध्ये काम दिले होते तो स्टोअर किपर म्हणून काम करीत असे त्याने त्याच्या स्टोअरमधून येताना धोतराच्या कनवटीला एक छोटासा तुरटीचा तुकडा चोरून आणला आणि त्या सर्वांनी सकाळी मिळालेले दूध तुरटी फिरवून विरजण लावलं त्यावेळी साखरेची पुडी वेगळी मिळायची या सर्वांनी ती साखर साठवून ठेवली होती खरंतर त्या चौघांना सकाळी दोघा दोघांच्या पाळीने दोन पायली दळण दळावे लागे त्या दिवशी दोघांनी उपाशीपोटी दळण दळले कारण दुसऱ्या दिवशी श्रीखंड खायचं काम होत ना आणि पाडवा साजरा करायचा होता. मग त्यांनी संध्याकाळी जे घट्ट लागलेले दही होते ते धोतराच्या फडक्यात बांधून रात्री तुरुंगाच्या गजाच्या बाजूला बांधून ठेवले आणि त्याच्या खाली एक भांडे ठेवले गंमत म्हणजे त्या चक्क्यामधून जे पाणी खाली पडत होते त्याचा टप टप असा आवाज येत होता तुरुंगामध्ये रात्री 10 नंतर लाईट बंद आणि पुन्हा लाईट लावण्याची कुणालाही परवानगी नसे. फक्त जेलर हे काम करू शकत पण तेही क्वचितच नियम म्हणजे नियम रात्री पहाऱ्यावर असणाऱ्या शिपायाला ही टप टप टिकी टिकी सारखी ऐकू आली तो घाबरला त्याला वाटले कुणीतरी तुरुंग फोडत आहे. कारण सगळे क्रांतिकारी त्यामुळे हे सहज शक्य होते त्याने तातडीने अधिकाऱ्यांना बोलवले त्यांनी प्रत्येक बऱ्याकीत जाऊन तपास करायला सुरुवात केली की आवाज कुठून येतोय….. रात्रीची निरव शांतता…. अधिकाऱ्याच्या हातात बॅटरी…. प्रत्येक बर्याकि मध्ये तो प्रकाशझोत टाकून तपास होत होता… दिवसभराच्या कामाने कैदी गाढ झोपलेले…. एकेक बऱ्याक पाहत असताना तो पुढे पुढे येत होता बुटांचा टाॅक टाॅक आवाज आणि पुढे प्रकाश झोत बाकी सर्वत्र अंधार या चार मुलांच्या बरॅकित आवाज येतोय त्याच्या लक्षात आले. त्याने सर्वत्र बॅटरी फिरवली तर त्याला एक गाठोडे बांधलेले आणि त्यातून पाणी पडण्याचा आवाज येतोय हे लक्षात आले त्याने आत येऊन काठीन ढोसून उठवले आणि विचारले, “क्या है ये?” त्यावर दोघे घाबरून गेले ते म्हणाले, “हमे कुछ पता नही” पण उरलेल्या दोघातील एका तरुणांनी उत्तर दिले, ” “हमारा कल त्योहार है और हम श्रीखंड बनाके खा रहे है” त्याला श्रीखंड म्हणजे काही कळलं नाही पण धोका काही नाही हे पाहून तो खुश झाला. और कल देख लेंगे असं म्हणत तो निघून गेला दुसऱ्या दिवशी यांच्या अंघोळ्या झाल्या अंघोळ्या म्हणजे शिट्टीवर तांबे ओतून घेणे.. चार चार तांब्यामध्ये आंघोळ पूर्ण करावी असा शिरस्ता होता अंघोळ झाल्यावर या तरुणांनी गंध लावले. देवाचे नामस्मरण केले श्रीरामाला वंदन केले जय श्रीराम घोषणा दिली आणि तयार झालेले चक्क्यात साखर मिसळून तयार झालेली श्रीखंड खालले नंतर “वंदे मातरम वंदे मातरम” ची घोषणा दिली कारण त्यांना ठाऊक होते आता आपल्याला शिक्षा होणार आहे… एकदा भीती गेली की मग काय? त्यांना लगेच बोलावणे आलेच अधिकाऱ्याने त्यांना शिक्षा सुनावली या दोन तरुणांना हात वर बांधून पाच वाजेपर्यंत टांगून ठेवा आणि पाठीवरती वीस फटके चाबकाचे मारा. शिक्षा सुनावल्यावर हे दोघे मोठ्याने घोषणा देत राहिले, ” वंदे मातरम जय श्रीराम भारतमाता कि जय”त्यांना ओढत शिपायाने बांधण्यासाठी नेले त्यांचे हात बांधून ठेवले आणि पाठीवरती वीस फटके मारायला सुरुवात केली.
“ ए सोनू, तुमची जोडी अगदी स्वर्गातबनल्या सारखी आहे. अगदी इंग्रजी मध्ये म्हणतात त्याप्रमाणे “Made for each other ” … मिनू सोनूला सांगत होती…..
सोनू तिला म्हणाली की “ अग असे काही नसते…. जोड्या स्वर्गात जुळवल्या जातात आणि पृथ्वीवर त्या प्रत्यक्षात दिसतात असे म्हणतात ते खरे आहे… “
या दोघींचा संवाद ऐकून मी विचारमग्न झालो….
आजपर्यंतच्या आयुष्यात अनेक जोड्या पाहिल्या,
काही जवळून तर काही दुरून….
काही चित्रपटात तर काही प्रत्यक्षात..
काही नात्यातील तर काही परक्या….
… स्वतःची जोडी ही अशीच एका सावध/बेसावध क्षणी जुळली गेली….
आयुष्याच्या मध्यान्ह होताना असे लक्षात आले की जोड्या स्वर्गात जुळतात हे कदाचित खरे असेल, पण त्या या पृथ्वीवर जुळण्यासाठी, नव्हे जुळवून घेण्यासाठी मात्र काहीतरी वेगळे कौशल्य जोडीतील दोघांकडे लागते.
महान लेखक व. पू. काळे एका ठिकाणी लिहितात,
लग्न पत्रिकेवर गणपतीचे चित्र छापून आणि लक्ष्मी प्रसन्न असे लिहून संसार घरी लक्ष्मी रूपाने येणारी गृहलक्ष्मी होऊ शकत नाही. तर तिच्यातील लक्ष्मीची जागृती करण्याचे काम ज्या पतीला जमते, त्याचा प्रपंच सुखाचा होण्याची शक्यता असते.
पतीसाठी घरदार सोडून आलेल्या, नवऱ्यापेक्षा वयाने लहान असलेल्या मुलीला आपल्या नवऱ्याचे घर आपले वाटावे, किमान इतकं तरी त्या नवऱ्याने आणि सासरच्या माणसांनी तिच्याशी सौजन्याने वागले पाहिजे….
आधी संवाद, मग सहवास, पुढे त्यातून विश्वास आणि अकृत्रिम स्नेह…
आणि
मुख्य म्हणजे प्रपंचात राहिलेल्या ‘गाळलेल्या’ जागा रिकाम्या न ठेवता ज्याला दिसतील त्याने मूक राहून भरणे…
हे यातील काही टप्पे असू शकतील….
एकेमकांना जाणून घेत, घरातील माणसांशी जुळवून घेत, दैनंदिन व्यवहारात प्रेम, माया, स्नेह जपत, वाढवत केलेला प्रमाणिक व्यवहार पती पत्नीचे नाते दृढ आणि उबदार करीत असतो आणि याला जर सम्यक सुखाची जोड मिळाली तर मग पती पत्नीच्या नात्याला बहार येते, मोगऱ्याचे ताटवे बहरू लागतात….
ज्या जोडप्यांनी, जोड्यांनी असे प्रयोग करून पाहिले असतील, अनुभवले असतील, लेख वाचताना त्यांच्या चेहऱ्यावर मंद स्मित झळकले असेल….
प्रत्येकाने आपल्या जोडीदाराला समजून घेत आनंदी जीवन जगण्याचा प्रयत्न करू….