मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मी मतदार — भाग – ५ ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? मनमंजुषेतून ?

☆ मी मतदार — भाग – ५ ☆ श्री सुनील देशपांडे ☆

मी गोंधळलेला.

मी मतदार का आहे ?

कारण आपल्या देशात लोकशाही आहे. लोकशाही म्हणजे लोकांचे, लोकांनी बनवलेले लोकांसाठी असलेले सरकार. म्हणजेच जनता सार्वभौम. म्हणजे जनताच राज्य करणार.

बूट पॉलिश मधल्या गाण्यामधले शब्द आठवतात…..

आने वाली दुनिया मे,

सबके सर पे ताज होगा !

हे सर्व म्हणजे नागरिक शास्त्राचे पुस्तकातील लोकशाही बाबतचे तत्त्व. लोकशाही येण्यापूर्वी रचलेली गाणी किंवा सिनेमातील कल्पना म्हणजे लोकशाही बद्दलचे स्वप्नरंजन. आता पंचाहत्तर वर्षानंतर लोकशाही म्हणजे काय हे थोडे थोडे प्रत्यक्षपणे समजू लागले आहे असे वाटत असतानाच मनात सगळा गोंधळ दाटला आहे.

लोकशाहीचे पहिले तत्व बहुमताचे सरकार.

इतक्या वर्षांमध्ये एकच लक्षात आले आहे की ज्या पक्षाला वीस ते पंचवीस टक्के मते मिळतात तो पक्ष राज्यकर्ता होतो. म्हणजेच पंचाहत्तर ते ऐंशी टक्के लोकांना नको असलेला पक्ष हा राज्य करतो. हे बहुमताचे सरकार ?

मतदार हा राजा .

या राजाच्या स्वागतासाठी काय काय गोष्टी राज्यकर्त्यांकडे असतात ? पोलीस यंत्रणा, लाठी मार, अश्रुधुर, धरपकड, अटक सर्वात शेवटी सैन्यबळ.

पूर्वी ज्याप्रमाणे संपूर्ण सिनेमांमध्ये (किंवा त्याकाळी प्रत्यक्षही असेल) असे दाखवायचे की जो खलनायक असतो तो चुकीच्या गोष्टी राजाच्या मनात भरवतो. गैरसमज निर्माण करतो. राजाची मती भ्रष्ट करतो. चुकीचे आणि खोटे पुरावे राजासमोर ठेवतो, आणि प्रत्यक्ष राजाच्या नावावर खलनायकसुद्धा राज्य करू शकतो.

लोकशाहीमध्ये वेगळे काय दिसते आहे ?

मतदार फक्त एक दिवसाचा राजा. फक्त मतदानाच्या दिवशी. पण त्याही दिवशी धाक, दपटशा, पळवा पळवी, लाचलुचपत व फसवणूक अशा पद्धतीने त्या दिवशी सुद्धा राजाला स्वस्थपणे मतदान करू न देता नामोहरम केले जाते.

या सर्व भल्या बुऱ्या मार्गाने सत्ता मिळाल्यानंतर पुढील निवडणूक येईपर्यंत त्या राजाला नामोहरम करण्याच्या बाबतीत कुठेही कमतरता होत नाही. गेली पंचाहत्तर वर्षे ज्या पद्धतीचे राज्य नशिबाला आले आहे त्यात सर्वांचे भले, गरिबांचे भले करणे हे सर्वच राज्यकर्त्यांचे ध्येय असते म्हणे. परंतु ते काही होत नाही. शेतकरी राज्यकर्ता झाला तरी त्या राज्यात शेतकऱ्यांचे भले झालेले दिसले नाही. कामगार राज्यकर्ता झाला तरी त्याच्या राज्यात कामगारांचे भले झालेले दिसले नाही. सर्वसामान्य मनुष्य राज्यकर्ता झाला तरी त्याच्या राज्यात सर्वसामान्यांचे भले झालेले दिसले नाही.

प्रशासनाने स्वतःच्या राजाला ज्या पद्धतीने वागवले आहे त्यावरून मतदार राजा खरंच आहे का हो ?

या प्रश्नाचे उत्तर मी मतदार म्हणून शोधतो आहे.

पूर्णपणे गोंधळलेला,

आणि कन्फ्युज्ड !

© श्री सुनील देशपांडे

नाशिक मो – 9657709640 ईमेल  : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ एक वाटी साखर – ☆ डॉ. जयंत गुजराती ☆

डॉ. जयंत गुजराती

??

☆ एक वाटी साखर – ☆ डॉ. जयंत गुजराती

तीन दिवस झाले तो बोलत नव्हता. रोज उत्साहाने थुईथुई नाचणारा विलास आज तर एकदम गप्प गप्प. काहीतरी नक्कीच बिनसलं होतं. हॉस्टेलमधे सर्वांशी मिळून मिसळून वागणारा, सर्वांची मिष्कीलीने यथेच्छ चेष्टामस्करी करणारा अचानक अबोल होऊन जाईल हे अचंबित करणारंच. तसं आमचं हे कॉलेजचं शेवटचं वर्ष. त्यात प्रिलिम तोंडावर आलेली. लगेच दोन महिन्यानंतरच्या फायनल परीक्षेचा फॉर्म भरण्याची तारीख ही उद्यावर येऊन ठेपलेली.  फायनल झाली की सगळे आपापल्या गावी जाण्यासाठी पांगणार. मग पुन्हा कधी एकत्र येणं होईल न होईल, तेव्हा ‘जी भर के जी लो.’  हे हॉस्टेल लाईफचं ब्रीदवाक्य सगळे अक्षरशः जगत होते. आमची बॅच तशी दंगामस्ती करण्यासाठी नावाजलेली. त्यातही विलास तर नेहेमीच आघाडीवर राहणारा. तो जसा कॉलेजातला क्लासमेट तसा हॉस्टेलमधला रूममेट.  गेली साडेचार वर्षांचा सहवास.  सगळं करायचं तर एकत्र करायचं हा शिरस्ताच. दंगामस्ती असो वा अभ्यास. इतर रूममेट्सही त्यात सहभागी. मस्तच झालेलं, चाललेलं जगणं. शेवटच्या परीक्षेबद्दलही तसे सगळे अपबीट. कधी एकदाची देतो परीक्षा आणि फडशा पाडतो पेपरचा हा अभिगम. एकूण तसं काहीच कारण नव्हतं विलासचं उदास राहण्याचं. 

आज सकाळपासूनच तो मला टाळायचा प्रयत्न करत होता. कॅन्टिनमधे जाऊन सकाळचा नाष्टा एकट्याने केला. नंतर कॉलेजच्या लायब्ररीत जाऊन वाचत बसला. लंचलाही कॅन्टिनमधे उगवला नाही.  दुपारचे क्लास तर बुडवलेच. नेहेमी सिन्सिअर राहणाऱ्या विलासकडून ही अपेक्षा नव्हती. नेहेमी उत्फुल्ल व उल्हासित असणारा विलास मलूल चेहेरा घेऊन वावरत होता. गेले दोन दिवस ‘राहू दे त्याला एकटं! आपोआप त्याळ्यावर येईल!!’ असं ठरवलं होतं. अजिबात बोललो नाही  त्याच्याशी. तोही तुटक तुटकच वागत असलेला. जणू मला नाकारतच होता. आज सगळं मलाच असह्य व्हायला लागलं. दुपार टळून गेल्यावर त्याला गाठण्यासाठी मी लायब्ररीत गेलो तर तो तिथे नव्हता. इतर मित्रांकडे चौकशी केली तर तो कॅम्पसमधे दिसलाच नसल्याचा निरोप मिळाला. आता मी अस्वस्थ.  हे जे काही घडत होतं ते तितकंसं चांगलं तर निश्चित नव्हतं. काहीतरी बिनसलं होतं व ते नक्की काय? याचा छडा लावण्याचा मी निर्धार केला.  सगळ्यांना मग मी विचारत सुटलो. बहुतेकांनी काही माहित नसल्याचं सांगत कानावर हात ठेवले. एकादोघांनी त्याचं वागणं खटकल्याचं बोलून दाखवलं, पण असेल वैयक्तिक कारण म्हणून विचार करणं सोडून दिलेलं. उलट मीच त्याचा रूम पार्टनर म्हणून मलाच खोदून खोदून विचारायला लागले की मामला काय आहे? 

मामला नक्कीच गंभीर होता. जीवलग म्हणवणारा मित्र अचानक तुटतो व आपण दोन दिवस त्याला वाऱ्यावर सोडून देतो याचा अपराधीपणाचा भाव मला छळू लागला.  मी त्याच्यावर रागवायला हवं होतं. असा का वागतो याचा जाब विचारायला हवा होता. दोन मुस्कटात दिली असती तरी चाललं असतं पण तो दुरावला नसता असा! प्रकरण तसं गंभीर असल्याशिवाय तो असा वागणार नाही याची तशी खात्री होती पण ते नेमकं प्रकरण काय? हे बघायला हवं होतं. सुदैवाने विलासने त्याचा घरचा फोन नंबर मागे शेअर केला होता. साधं सरळ ख्यालीखुशालीची चौकशी केल्यागत मी कॉल लावला, तर समोर विलासच्या आईनेच तो उचलला. रोज रात्री विलास घरी फोन करून, त्यावर घरच्यांशी जुजबी का होईना बोलून मगच झोपत असे. गेले दोन दिवस त्याने घरी फोनच केला नव्हता! हे मला नेमकं त्याक्षणीच उमगलं. समोरून  विलासची आई तर फोनवर भडभडून बोलू लागली. बोलत असताना ती आसवं ही गाळत असावी हे मला स्पष्ट जाणवत होतं. मी तिला बराचवेळ बोलू दिलं.  शेवटी काळजी करू नका. सांगून फोन ठेऊन दिला.

हे सगळं होताना    माझ्या डोळ्यात आसवंच आली. तसा मला रागही आला, प्रचंड राग आला विलासचा व मला माझाही. त्याला गुद्दे मारावेत, ठोसे द्यावेत, झोडपून काढावं, काहीबाही बोलावंसं वाटलं पण त्या घटकेला मला गावी असलेली माझी आईच आठवली. माझी आई तशी पोक्त व धोरणी, कुणाचंही अंतरंग तिला सहज कळत असे. लहानपणी तिने शिकवलेला धडा तर कायमचा लक्षात राहणारा. त्यावेळेस आम्ही चाळीत रहात होतो. सगळा मध्यमवर्गीय शेजार. सगळे खाऊन पिऊन सुखी होते. तरीही महिना संपत आला की प्रत्येकाची ओढाताण होत असे. एक तारखेला झालेला पगार महिना अखेरीस पुरत नसे. त्याकाळीही महागाई पाचवीलाच पुजलेली. आईबाबांच्या काटकसरीच्या व बचतीच्या सवयीमुळे कुणा पुढे हात पसरण्याची पाळी निदान आमच्यावर येत नसे. बाबांनी नाही म्हटलं तरी बऱ्यापैकी गंगाजळी साठवून ठेवली होती. त्यावेळी चाळीतलं वातावरण आपुलकीचं व  खेळीमेळीचं होतं. अडीअडचणीला एकमेकांचं बघणं हा स्थायीभाव.  महिना अखेरीस शेवटचा आठवडा काढताना एकमेकांकडे एक वाटी साखर, दही, तेलतूप प्रसंगी स्वस्त असलं तरी मीठही हे मागणं सहज होत असे. यात संकोच वाटत असलातरी हा देवघेवचा व्यवहार असे. शेजारपाजारी मागणं याची पाळी आमच्यावर क्वचितच येत असे, पण आईच्या शहाणपणाने आम्हांस जो धडा घालून दिला तो काळ्या दगडावरची रेघ ठरलेला. कायमचा मनावर कोरला गेलेला. घरात गरज नसतानाही ती शेजारीपाजारी एक वाटी साखर मागायला पाठवत असे. मग मी सांगायचो. “आई साखर तर आहे घरात मग ती कशाला मागत फिरायचं?” बाबा त्याकाळी रेशनकार्ड चालू रहावं म्हणून रेशनच्या लाईनीत उभे राहून साखर आणायचे. तीही स्वस्त मिळते म्हणून. माझ्या प्रश्नावर आई गंभीर होत सांगत असे “हे बघ जयु, सगळी बोटं सारखी नसतात. प्रत्येकाला सगळं मिळूनच राहतं असं नाही. इतरांकडे मागण्याची पाळीही येते. ती आपल्यावर येत नाही हे आपलं नशीब. आपल्याकडे आहे म्हणून आपण शेजाऱ्यांना देत असतो, नाही म्हटलं तरी मागताना शरम, संकोच हे वाटत असतंच. आपल्याला गरज नसली तरी आपणही क्वचित मागत राहिलो तर शेजाऱ्यांना हा संकोच वाटणार नाही व आपल्यालाही त्यांची गरज आहे हे त्यांना पटत राहील, जाणवत राहील. तसेच मागण्याने आपल्यातही आपल्याकडे सगळं आहे याचा गंड निर्माण होणार नाही. तेव्हा जा साखर घेऊन ये!”  आईचं म्हणणं त्यावेळेस अनाकलनीयच वाटत होतं पण आता ते अक्षरशः पटत होतं. 

विलासच्या आईने सांगितलेली हकीकत विलक्षणच होती. कोरोना काळात विलासच्या वडिलांची नोकरी गेली. पन्नाशी उलटलेली असल्याने दुसरी नोकरी कोणी देईना. नवीन उत्पन्नाची साधनं उभी करण्यात प्रॉव्हिडंड फंडची रक्कम गमावली. थोडीफार बचत होती त्यावर दोन वर्षं घरखर्च व विलासच्या शिक्षणाचा खर्च निभावलेला, धाकटी बहिणही घरी असलेली ती कॉलेजच्या पहिल्या वर्षात. तिचं सगळंच बाकी असलेलं. ‘आमच्याकडचे सगळे पैसे संपलेत, तुला पाठवण्याइतपतही नाही. सगळा भार तुलाच उचलावा लागेल. परीक्षा दे व लवकर कमवता हो म्हणजे आमची काळजी मिटेल.’ असं विलासला मागच्याच आठवड्यात सांगून झालं होतं. केविलवाण्या स्वरात हे सगळं विलासची आई सांगत होती तेव्हा काळीज पिळवटून निघत होतं. सुन्न करणारीच बातमी ही.  जी आजपर्यंत विलासने आमच्यापासून लपवून ठेवली होती. तो काही बोललाच कसा नाही याचं आश्चर्य, विलक्षण राग, संताप, सगळं मनात उमटत राहिलं. विलासने आम्हाला परकं मानलं हे जिव्हारी लागणारं.  त्याला तातडीने शोधलं पाहिजे. उद्या तर परिक्षेची फी भरण्याचा शेवटचा दिवस. त्याला गाठून कुणालाही कुठलीही कुणकुण न लागू देता तिढा सोडवावा लागेल. बाबांनी लावलेली बचतीची सवय आज कामास येत असलेली. गेल्या साडेचार वर्षात बाबा पैशे पाठवायचे, त्यातून वाचवलेले पैसे आता उपयोगी पडणारेत. विलास कुठे असेल याचा अंदाज, खात्रीच म्हणाना मला आलेला. गावाबाहेर तळ्याकाठी गणपतीचं मंदिर आहे. तेथे कट्ट्यावर आम्ही तासनतास बोलत बसत असू. मी त्याला गाठलंच. शून्यात पाहत असल्यासारखा बसून होता. मी हाक मारून पाकीट त्याच्या हाती ठेवले. पाकिटात वीस हजार रुपये होते. परिक्षेची फी व दोन महिन्याचा त्याचा खर्च यातून निभाऊन जाईल. विलासने पाकिट हातात घेत मिठीच मारली व घळाघळा रडू लागला. मग मी त्याला एक वाटी साखरेची गोष्ट सांगत बसलो. 

© डॉ. जयंत गुजराती

नासिक

मो. ९८२२८५८९७५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मी मतदार — भाग – ४ ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? मनमंजुषेतून ?

☆ मी मतदार — भाग – ४ ☆ श्री सुनील देशपांडे ☆

मी गोंधळलेला.

पु ल देशपांडे यांच्या ‘एक शून्य मी’ या पुस्तकातील ‘सत्तेच्या साठमारीत लोकशाहीचा बळी’ हा लेख खरंच सर्वांनी पुन्हा पुन्हा वाचावा. तो वाचल्यावर लक्षात येतं की राजकारणात साधन शुचिता ही पूर्वीपासूनच नाही. त्यामुळे कुठल्यातरी एका माणसाला पकडून त्या माणसाकडे साधन शुचिता नाही असा आरोप करणे ही गोष्ट हास्यास्पदच आहे. त्यात जातीयवादाचे विष गुंफून या राजकारणात आणखी एक विकृतीचा पैलू मिसळून विचार करणं हा आणखी वाईट प्रकारचा उपक्रम आहे. सध्या जातींचा उपयोग हा फक्त राजकारणासाठी आणि मतांच्या विभाजनासाठीच केला जातो. खरं म्हणजे राजकारणी माणसाची जात म्हणजे ‘राजकारणी’ मग त्याची जन्मजात कुठली का असेना, त्याचा उल्लेख हा गैरलागूच आहे. जोपर्यंत सध्याच्या पद्धतीचे राजकारण आहे. तोपर्यंत जातीअंताची लढाई कधीही यशस्वी होऊ शकणार नाही असे वाटण्याला नक्कीच वाव आहे. स्वतःच्या राजकीय अस्तित्वासाठी इतर पक्षांची मोडतोड करणे फाटा फूट करणे शक्य असतील ते छोटे मोठे प्रादेशिक पक्ष शक्यतो नष्ट करणे किंवा गलितगात्र करणे हा उद्योग मागील कित्येक वर्षे चालू नाही असे कुणाला म्हणावयाचे आहे काय ? अभद्र युत्या किंवा आघाड्या बनविणे. कोणत्याही प्रकारच्या वैचारिक भूमिका जुळत नसतानाही सत्तेच्या साठमारीसाठी राजकारणाची तडजोड करणे हे तर आपण कित्येक वर्षे पाहतोच आहे. निदान मी तरी मागील पन्नास वर्षे पाहतो आहेच. महाराष्ट्राबद्दलच बोलायचे झाले तर अगदी शेका पक्षापासून ते शेतकरी संघटनेपर्यंत अनेक प्रादेशिक पक्ष आणि संघटना यांचे वाटोळे या राजकारण्यांनी केलेलं आहेच. आता नवीन लोक राजकारणामध्ये आले आहेत म्हणून त्यात काही बदल होण्याची शक्यता कशासाठी गृहीत धरायची ? आलेले लोकही कोणत्या जातीचे धर्माचे आहेत याचा विचार करून मतदारांनी किंवा इतर सर्वांनी त्यांच्याकडून काही वेगळ्या अपेक्षा ठेवायचेही काही कारण नाही. कधी कधी असेही वाटते की एखाद्याकडे चांगली धोरणे असतील तरीसुद्धा ती धोरणे राबविण्यासाठी सत्ता टिकवणे कोणत्याही मार्गाने का होईना पण आवश्यक आहे. ती सत्ता मिळवण्यासाठी साधनशुचितेचा उपयोग करून प्रामाणिकपणे सत्ता मिळवता येत नाही असेच सध्याचे चित्र दिसते. सत्ता मिळवणे व ती टिकवणे या गोष्टींची आवश्यकता धोरणे राबवण्यासाठी आहेच. पाच वर्षानंतर भाजप हा पक्ष जर पुन्हा निवडून आला नसता. तर 370 हटवणे व राम मंदिर बांधणे तसेच आणखी ज्या काही गोष्टी त्यांना धोरणात्मक पद्धतीने राबवणे आवश्यक होते त्या राबवता आल्या असत्या का ?

त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत सत्ता टिकवणे अत्यावश्यक आहे आणि तो राजकारणाचा एक आवश्यक भाग आहे असे आता मतदारांनाही पटू लागले आहे. त्यामुळे आता राजकारणातील चमत्कार याला गलिच्छपणा किंवा चिखल म्हणण्यापेक्षा हा राजकारणाचा राजमार्ग आहे असे का म्हणू नये ? कारण स्वातंत्र्यानंतर हेच तर चालू आहे.

एक सामान्य मतदार म्हणून मला आता असेच वाटू लागले आहे.

अर्थात माझे वाटणे बरोबर की चूक हे मात्र मला समजत नाही. कारण

मी सर्वसामान्य मतदार,

पूर्णपणे गोंधळलेला,

आणि कन्फ्युज्ड !

© श्री सुनील देशपांडे

नाशिक मो – 9657709640 ईमेल  : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “लेखणी माझी धारदार…” ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ “लेखणी माझी धारदार” ☆ सौ राधिका भांडारकर 

शाळेत असताना माझ्या काही आवडत्या कविता होत्या.

वा.भा. पाठक यांची,

खबरदार जर टांच मारुनी जाल पुढे चिंधड्या 

उडविन राई राई एवढ्या

किंवा

कुसुमाग्रजांची,

म्यानातून उसळे तलवारीची पात

वेडात मराठे वीर दौडले सात

तसेच केशवसुतांची,

एक तुतारी द्या मज आणुनी

फुंकीन  मी जी स्वप्राणाने 

भेदूनी टाकीन सगळी गगने..

दीर्घ जिच्या त्या किंकाळीने

अशा आणि अशाच प्रकारच्या अनेक कविता. या कविता पाठांतराला असत आणि वर्गात सामूहिक रित्या म्हणताना आतून खूप काही प्रेरणादायी, स्फूर्तीदायी वाटायचं.

शिवाय त्यावेळी देशात युद्धाचेही वातावरण होते. चीन आणि पाकिस्तान बरोबरच्या त्या दोन लढायांनी कुमार वयात मनावर बराच परिणाम केलेला होता. 

माणुसकीच्या शत्रुसंगे युद्ध आमुचे सुरू किंवा,

मुलख आपला गिळायला टपलाय बसलाय बगळा साधूवाणी

हा दादा कोंडके लिखित पोवाडा आम्ही अगदी त्वेषाने गात असू.

विश्वास आणि आत्मबळ वाढवणारं हे लेखन असायचं.

हे सगळं सांगण्याचा उद्देश असा की त्याच काळात आपणही काहीतरी लिहू शकतो असे जाणवू लागले होते आणि त्या वेळेच्या लेखन गुणांवर या साहित्याचा कळत नकळत संस्कार होत होता. मनापासून वाटायचं लिहावं तर असं धारदार, परिणामकारक, समाजशील,  परिवर्तन करणार,प्रवर्तक. खरं म्हणजे वय होतं छुपंछुपं प्रेमकाव्य करण्याचं, तू माझा— मी तुझी अशा कथा लिहिण्याचं, किंवा मैत्रिणींच्या गळ्यात गळा घालून गुजगोष्टी लिहिण्याचं. उमलणारं, फुलणारं, संवेदनशील कधी रडवणारं कधी हसवणारं लिहिण्याचं.  तसं खूप लिहिलंही.

एकेका वयाच्या टप्प्यावर लेखनाचे विषय, वातावरण,पात्रेही आपसूकच बदलत गेली. आयुष्यात येणाऱ्या एकेका अनुभवाने मन घडत गेलं तसं लेखनही प्रवर्तक होत गेलं.अधिक प्रौढ होत गेलं. पण त्यावेळी लिहून झाल्यावर असं वाटायचं आपलं लेखन एका चौकटीतलं आहे. ज्या समाजात आपण वावरतो, ज्या व्यक्ती आपल्या भोवती आहेत त्यातून दिसणाऱ्या जीवनाची टिपणं आपल्या लेखनात सहजपणे प्रतिबिंबित होतात पण हे आपल्या भोवतीच वर्तुळ मर्यादित आहे. या पलीकडे खूप मोठं जग आणि जीवन आहे तिथपर्यंत आपण पोहोचायला हवं, पोहोचण्याचा प्रयत्न करायला हवा. आपल्या लेखनात न अनुभवलेल्या पण जगात घडणाऱ्या अनेक घटनांचे धारदार पडसाद पडायला हवेत. ते अधिक समाजशील व्हायला हवे. आणि मग ती एक वैश्विक नजर वाचनातून, दृकश्राव्य माध्यमातून, सजगतेतून विचारातून, प्रश्नांतून, प्रत्यक्ष पाहून अथवा कानो कानी ऐकूनही  मी मिळवण्याचा प्रयत्न केला.. प्रयत्न करत आहे. आणि माझ्या लेखणीला तसा सराव प्राप्त करून देत आहे.

रात्र वैऱ्याची आहे जागा हो असं काहीतरी आतून धक्के दिल्यासारखं जाणवतं आणि ही संवेदना माझ्या लेखनाला धार देते.

नवं जग कसं असणार याचे स्वप्न स्वातंत्र्यापूर्वी पाहिलं गेलं आणि त्याच जाणीवेतून सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक अशा क्षेत्रात बदल घडवून आणणारं लिखाण झालं. कविता, पुस्तकं लिहिली गेली. रंगभूमीवर अशा विषयांची दमदार नाटकं सादर झाली. जी जनता खाली मान घालून जगत होती तिला स्वप्नं पाहायला शिकवली. त्या काळात गणेश शंकर विद्यार्थीं या सारख्या क्रांतिकारांनी प्रताप नावाच्या मासिकातून लोक जागृती केली होती. टिळकांनी, आगरकरांनी केसरीतून लोकांची मने सकारात्मक रित्या पेटवली होती. साने गुरुजींची पत्री पत्रकांनी गुलामगिरीवर आसूड मारले होते. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या वेळी प्र. के. अत्रे यांनी मराठा वृत्तपत्रांतून संपादकीय युद्धच जणू केले. कवी राजा बढेंनी,

जय जय महाराष्ट्र माझा ची धारदार घोषणा केली.

 संत तुकारामांनी म्हटलं आहे,

आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने

शब्दांचीच शस्त्रे यज्ञ करू 

शब्दचि आमच्या जीवाचे जीवन

शब्द वाटू जनलोका …

आणि आज पुन्हा एकदा असाच उठाव करण्याची निकड निर्माण झाली आहे. वेगळ्या प्रकारची गुलामी आजही कायम आहे. भांडवलशाहीचा वरवंटा सामाजिक जीवनावर फिरतोय. बरं जीवन जगण्याकरता या पलीकडे जाऊन निडरपणे मानव मुक्तीचे जग निर्माण करण्यासाठी झोकून देण्याची वेळ आली आहे.

 “भले ते देऊ कासेची लंगोटी

 नाठाळांच्या माथी

 हाणू काठी”

अशा कृतीची आज गरज आहे. राजकारण हा माझा विषय नाही पण ज्या समाजात मी राहते त्या समाजाविषयी मला तळमळ असणं स्वाभाविक आहे. म्हणूनच एक लेखिका म्हणून आणि त्यातूनही एक स्त्री लेखिका म्हणून मी कसं लिहायला हवं, काय लिहायला हवं याचा डोळसपणे, समंजसपणे विचार करू शकते. सभोवताली घडणाऱ्या स्त्री अत्याचारांच्या घटनांनी माझं मन कळवळतं.तरुणांच्या आत्महत्येने मी उदास होते.शेतकर्‍यांच्या आत्महत्या मला उद्विग्न करतात. संपत्तीची लालच,सत्तेचा लोभ, त्यान्वये होणार्‍या नीच स्पर्धा, यंत्रयुगामुळे होणारा पर्यावरणाचा र्‍हास,कुटुंब संस्थेची मोडतोड,संपुष्टात आलेले संवाद मला त्रस्त करतात. माझ्या मनात एक जिवंत झरा आहे. मी कोरडी ठणठणीत, बथ्थड, आत्मकेंद्री, स्वमग्न राहूच शकत नाही. त्यामुळे माझी लेखणी धारदार आहे.कधी ती फुलासारखी कोमल असू शकते आणि तितकीच वज्रासारखी कठोरही बनू शकते. माझ्या लेखणीला सहस्त्र नेत्र आहेत. ती बाह्यरंग टिपते, अंतरंग टिपते. आणि पाकळ्या पाकळ्या उलगडून समर्थपणे सत्याच्या गाभ्यापर्यंत जाण्याचा सकारात्मक प्रयत्न करते.ती निडर,स्पष्ट आणि पारदर्शी आहे. समाज बदलेल की नाही हे तिला माहित नाही.  जे जे वाईट, नकोसे, अश्लील, बीभत्स, रौद्र तामसी समूळ नष्ट होईल किंवा नाही पण त्यावर प्रहार करणं हे माझ्या लेखणीचं कर्तव्य आहे आणि ती ते मनापासून, धार्मिकपणे, मुल्ये, नीती यांच्या चौकटी सांभाळून जाणीवपूर्वक करते. यश अपयश काळच ठरवेल पण पेर्ते व्हा, लिहिते व्हा हाच माझ्या लेखणीचा मानवीय धर्म आहे.

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मी मतदार — भाग – ३ ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? मनमंजुषेतून ?

☆ मी मतदार — भाग – ३ ☆ श्री सुनील देशपांडे ☆

मी गोंधळलेला.

मग एकाने मला पटवून दिलं पक्ष बघून मत द्या उमेदवार बघून नको.

एकूण परिस्थिती बघता समजा पक्ष म्हणून मत दिलं तर तो उमेदवार त्या पक्षात राहील का? तो पक्षच त्या पक्षात राहील का? तो पक्षच दुसऱ्या पक्षात सामील होणार नाही का ? त्या पक्षाची फाटा फूट होऊन वेगवेगळ्या विचारसरणीचे अनेक पक्ष त्यातून निर्माण होणार नाहीत का ?

मग त्यात मी पुन्हा कोणाला मत द्यायचं? आत्ता दिलेलं माझं मत वाया गेल्यास त्याचं काय ? खरं म्हणजे सगळंच कन्फ्युजन आहे.

आज जे पक्षाचे धोरण आहे तेच धोरण उद्या असेल का? कशाचाच कशाला काही मेळ लागत नाही. आज जे नेते पक्षाबद्दल त्या धोरणाबद्दल खूप भरभरून चांगलं चांगलं बोलतात ते पुन्हा काहीतरी वेगळी भूमिका घेणार नाहीत का? मग माझं मत वाया जाईल ना ?

त्यापेक्षा मतदान न केलेलं काय वाईट ?

पण मग मी मतदानच नाही केलं तर जे मतदान करतील ते सगळे पैसे घेऊन भ्रष्ट पद्धतीने मतदान करणारेच बहुसंख्य असतील. मग भ्रष्ट व गुंड प्रवृत्तीचा माणूस निवडून येणे हे 100% नक्की. मग मी आणि माझ्यासारख्या अनेकांनी मतदान न करणं ही चूक झाली असं होणार नाही का ?

मी गोंधळलेला.

पूर्णपणे कनफ्यूज्ड.

© श्री सुनील देशपांडे

नाशिक मो – 9657709640 ईमेल  : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ बहिणाई ☆ श्री सुनील शिरवाडकर ☆

श्री सुनील शिरवाडकर

??

☆ बहिणाई… ☆ श्री सुनील शिरवाडकर

  

जो असतो परंतु दिसत नाही तो देव..

आणि जे दिसतं परंतु कधीच नसतं ते भेव”

ह्या ओळी लिहिलेल्या आहेत कवियत्री बहिणाई चौधरी यांनी. बहिणाईंच्या कितीतरी गाण्यांमधुन त्यांची देवावरील निस्सीम भक्ती समजते.पण त्यांचा देव केवळ दगडाच्या मुर्तीत नव्हता.त्यांचा देव निसर्गात..शेतामध्ये.. पिकांमध्ये होता.शेतात आपण लावलेली रोपे हळूहळू मोठी होऊ लागतात.. त्याची पाने वाऱ्यावर डोलू लागतात. आणि बहिणाई बोलू लागतात..

टाया वाजवती पानं

दंग देवाच्या भजनी

जमिनीची मशागत करताना त्यांनी उघड्या डोळ्यांनी अनेक क्षण टिपले. त्या पाखरांवर..जनावरांवर माया करतात. पाऊस म्हणजे तर त्यांचा जीवाभावाचा सोबती.

आला पाऊस पाऊस

शिपडली भुई सारी

धरत्रीचा परीमय 

माझं मन गेलं भरी

आला पाऊस पाऊस

आता सरीवर सरी

शेतं शिवारं भिजले

नदी नाले गेले भरी

घरी दारी..कामात.. विश्रांतीत..सुखात.. दुःखात त्यांनी जे जे अनुभवले, त्याचे प्रतिबिंब त्यांच्या काव्यात उमटले.

कवियत्री इंदिरा संत म्हणतात..

बहिणाईंच्या कविता वाचताना पार्श्वसंगीता सारखी माझ्या मनात एक कल्पना नेहमी उभी असते.

आपण झुळझुळ वाहणाऱ्या निर्मळ प्रवाहाच्या काठाशी बसलो आहोत. आणि तळातील रंगीबेरंगी रेती,दगडगोटे आणि प्रवाहाचे तरंग यात अगदी गुंतुन जात आहोत.

आणि खरंच.. बहिणाईंच्या कविता वाचताना आपण त्यात अगदीच गुंतुन जातो.. गुंगून जातो.

बहिणाईंच्या कविता आपल्याला माहीत असतातच..पण त्यांच्या नेहमीच्या बोलण्यात देखील उपमा.. अलंकाराची रेलचेल असायची.

आसु नाही ती सासु कशाची?

आसरा नाही तो सासरा कशाचा?

आता सध्या जे करोनाचे संकट जगावर आले आहे.. तसेच शंभर वर्षांपूर्वी प्लेगचे आले होते. बहिणाईंनी ते दिवस बघितलेले…

त्या लिहीतात..

पिलोक पिलोक,आल्या पिलोकाच्या गाठी

उजाडलं गाव, खया-मयामधी भेटी

पिलोक पिलोक,आली नशिबात ताटी

उचललं रोगी

त्यानं गाठली करंटी

करंटी म्हणजे क्वारंटाईन. तेव्हा सरकार शंका आली की उचलून क्वारंटाईन मध्ये टाकत असत. (खरंतर आजही ते तेवढंच गरजेचं आहे).

सध्या करोना मुळे आपण सर्वच जण सक्तीच्या सुटीवर आहोत. आणि म्हणूनच काही जुनी पुस्तके.. काव्यसंग्रह बाहेर निघताहेत.बहिणाईंच्या कविता वाचताना आपण नकळतपणे शंभर वर्षापुर्वीच्या काळात जातो.

माझ्यासमोर जो बहिणाईंचा काव्यसंग्रह आहे..त्याला प्रस्तावना आहे आचार्य अत्रे यांची. पहिल्या आव्रुत्तीची एक आणि दुसर्या आव्रुत्तीची एक.त्या वाचल्यानंतर बहिणाईंच्या काव्यातील गोडी अधिकच जाणवते.

यात कवी सोपानदेव चौधरी यांनी आपल्या आईबद्दल लिहीलेले दोन दिर्घ लेख आहेत कवियत्री इंदिरा संत.. पद्मा लोकुर यांनी बहिणाईंच्या काव्याचे केलेले रसग्रहण आहे.थोर विदुषी प्रा.मालती किर्लोस्कर यांनी लिहीलेला लेख आहे.

बहिणाईंवर लघुपट बनवणारे चित्रपट महर्षी वसंतराव जोगळेकर. त्यांना हा लघुपट बनवताना उमजलेल्या बहिणाई.. त्यांनी एका लेखातून आपल्या समोर उभ्या केल्या आहेत.

आणि या सर्वांपेक्षा जास्त मनाचा ठाव घेते ती एक कविता. बहिणाईंवरच केलेली. त्याचे कवी आहेत.. बा.भ.बोरकर.

त्यांच्याच शब्दात या लेखाचा समारोप करतो. बहिणाई चौधरींना ते म्हणतात..

देव तुझ्या ओटीपोटी

देव तुझ्या कंठीओटी!

दशांगुळे उरलेला

देव तुझ्या दाही बोटी!

© श्री सुनील शिरवाडकर

मो.९४२३९६८३०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मी मतदार — भाग – २ ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? मनमंजुषेतून ?

☆ मी मतदार — भाग – २ ☆ श्री सुनील देशपांडे ☆

मी गोंधळलेला.

मी ठरवलं नोटाचा काही उपयोग नाही. आपण असं करावं का? जे काही उमेदवार उभे आहेत त्यापैकी त्यातल्या त्यात जो बरा उमेदवार असेल त्याला मत द्यावं ? दगडापेक्षा वीट मऊ !

क्र. एक – उमेदवार ज्या पक्षाचा आहे तो पक्ष कधीच सत्तेवर येऊ शकणार नाही. पण सत्तेसाठी अथवा पैशासाठी तो पक्ष दुसऱ्या पक्षाशी संगणमत करू शकेल. मग कशाला मत द्यावं ? आणि का ?

क्र. दोन – हा चांगला असला तरी तो निष्क्रिय आहे कधीच काही काम करत नाही. फक्त निवडून येतो. किंबहुना तो काही काम करत नाही म्हणूनच तो बरा आहे असं वाटतं का ? याला मत देण्यात काय अर्थ आहे ?

क्र तीन – समजा हा चांगला म्हणजे त्यातल्या त्यात बरा आहे. (कारण जो खरंच चांगला असतो तो निवडणुकीचा उमेदवार होईपर्यंत मोठा होतच नाही. किंवा राजकारणात सुद्धा येत नाही) पण त्याच्या पक्षाची धोरणं ही चुकीची आणि देशाला अयोग्य दिशेने नेणारी आहेत, असं माझं मत असेल तर, याला मी का मत द्यावं ?

क्र चार – हा उमेदवार वाईट आहे परंतु त्याचा पक्ष चांगला आहे त्या पक्षाची धोरणे चांगली आहेत मला ती योग्य वाटतात पण या माणसाला मी मत का द्यावं ?

मी गोंधळलेला.

पूर्णपणे कनफ्यूज्ड.

© श्री सुनील देशपांडे

नाशिक मो – 9657709640 ईमेल  : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ बस, छोरी समझके ना लढियो…!  ☆ कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त) ☆

कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त)

परिचय :

कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त)

(बी एससी, बी टेक, एलएलबी, एमपीएम, एमबीए)

  • एनडीए आणि आयएमए मध्ये प्रशिक्षणानंतर १९८१-२००७ सैन्यदलात इंजिनियर. 
  • SSB मधील सेनाधिकारी निवडप्रक्रियेत चार वर्षे सहभाग. 
  • २००७ ते आजपर्यंत खाजगी कंपन्यांचे अधिकारी-कर्मचारी आणि केंद्र व राज्य सरकारी अधिकाऱ्यांना विविध विषयांमध्ये प्रशिक्षण देण्याचा व्यवसाय.
  • छंद – लेखन, वाचन, संगीतश्रवण, प्रवास.

? मनमंजुषेतून ?

बस, छोरी समझके ना लढियो…!  ☆ कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त) ☆

१९९७ साली, पुण्याच्या एका सिग्नल युनिटमध्ये मी काम करीत होतो. राजस्थान बॉर्डरवरची टेलिफोन एक्सचेंजेस बारा महिने चालू अवस्थेत ठेवण्यासाठी, आमच्या काही छोट्या तुकड्या तेथेच वास्तव्याला असत. कंपनी कमांडर या नात्याने, त्यांच्या कामाच्या देखरेखीसाठी अधून-मधून मला पुण्याहून तेथे जावे लागे. 

माझ्या कंपनीत, मी आणि लेफ्टनंट गीता असे दोनच अधिकारी होतो. मी पुण्याबाहेर असल्यास आमच्या कंपनीचा दैनंदिन कारभार गीता उत्तम प्रकारे सांभाळत असे. 

वार्षिक युद्धसरावासाठी वर्षातून किमान एकदा, संपूर्ण युनिटला बॉर्डरवर हलवावे लागे. त्या काळात, पुण्याहून बॉर्डरपर्यंतच्या प्रवासाचे नियोजन, सर्व उपकरणे, व इतर सामानाच्या बांधाबांधीवर देखरेख, CO साहेबांसोबत चर्चा, मीटिंग्स अश्या उपद्व्यापात माझी खूपच धावपळ चालू असे. 

एकदा, मी अश्याच गडबडीत होतो आणि दुपारच्या जेवणाची वेळ होत आली होती. माझ्या लक्षात आले की तो जवानांच्या पगाराचा दिवस होता. मीटिंगला जाता-जाता मी गीताला सांगितले की पगाराची सर्व रक्कम मुख्य ऑफिसातून आणवून जवानांना पगार वाटण्याचे काम तिने पूर्ण करावे. ते काम सहजच तास-दीड तासाचे होते. 

गीताला आदेश देऊन मी पुढच्या कामासाठी बाहेर पडणार तेवढ्यात तिच्या चेहऱ्याकडे माझे लक्ष गेले. ती जरा अस्वस्थ आणि विचारमग्न दिसली. मी मागे वळलो आणि तिला विचारले, “काही प्रॉब्लेम आहे का गीता?”

ती गडबडीने उठून मला म्हणाली, “नाही नाही सर, काही प्रॉब्लेम नाही. मी लगेच कामाला लागते.” 

पण, माझे समाधान झाले नाही. कोणतेही काम केंव्हाही चालून आले तरी नाराज होणे हा गीताचा स्वभाव नव्हता.

मी पुन्हा खोदून विचारल्यावर ती म्हणाली, “सर, मी पगाराचे काम संपवूनच घरी जाईन. पण, एक विनंती आहे. आज संध्याकाळी गेम्स परेडसाठी मी नाही आले तर चालेल का? 

सर, चार महिन्यांपूर्वी लग्न झाल्यानंतर, काल प्रथमच माझे सासू-सासरे माझ्याकडे काही दिवसांसाठी आलेले आहेत. अजून पक्के घर न मिळाल्याने आम्ही दीड खोलीच्या टेम्पररी घरातच राहत आहोत. किचनच्या नावाने, गॅस ठेवण्यापुरते एक टेबल फक्त आहे. जगदीप [गीताचा आर्मी ऑफिसर नवरा, जो त्यावेळी पुण्यातच कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनियरिंग (CME) मध्ये पुढील शिक्षण घेत होता] परीक्षेच्या अभ्यासासाठी दिवसभर CME मध्येच असतो. घरी गेल्यावर गरम रोट्या बनवून सासू-सासऱ्यांना जेवू घालेपर्यंत उशीर होईल. म्हणून मी थोडी सवलत मागितली, इतकेच.”

एक अधिकारी, आणि नवीन लग्न झालेली सून, अश्या दुहेरी भूमिकेत असलेल्या गीताचा प्रॉब्लेम माझ्या लक्षात आला. मी तिला सांगितले, की तिने वेळेवर घरी निघून जावे आणि संध्याकाळच्या परेडसाठीही येऊ नये. पगारवाटपाचे काम मी स्वतः करेन, कारण माझ्या घरी स्वयंपाक करण्याची जबाबदारी माझ्यावर नव्हती.

पण, गीता माझी धावपळ देखील पाहत होती. संध्याकाळी तिला परत यायचे नसल्याने पगारवाटपाचे काम केल्याशिवाय ती घरी जाणार नाही, असे तिने स्पष्टपणे सांगितले. तिच्या चेहऱ्यावर स्वाभिमान, कृतज्ञता आणि माझ्याप्रति असलेली आस्था असे तीनही भाव मला स्पष्ट दिसले आणि तिच्याबद्दल माझ्या मनात असलेला आदर वाढला. 

पुढे आम्ही वार्षिक युद्धसरावासाठी राजस्थानात जोधपूर, बाडमेर, जैसलमेर भागात गेलो. नवीन टेलीफोन केबल्स टाकणे आणि ठिकठिकाणी खांब रोवून त्या केबल्स सुरक्षित करण्याचे काम गेल्या-गेल्या सुरु झाले. जवानांकडून ते काम करून घेण्याची जबाबदारी गीतावर होती. दूरदूर पसरलेल्या रेडिओ तुकड्यांवर देखरेख करण्यासाठी मी दिवसभर जीपमधून हिंडत होतो. केबल्सचे काम कसे झाले आहे ते पाहायला मला रात्रीपर्यंत वेळच मिळाला नव्हता. रात्री जेवण झाल्यावर, टॉर्च घेऊन एकटाच माझ्या तंबूमधून बाहेर पडलो आणि केबल्सच्या इन्स्पेक्शनसाठी निघालो. 

अचानकच गीता तिच्या तंबूमधून बाहेर आली आणि म्हणाली, “सर, दिवसभर तुम्ही बाहेर-बाहेरच असल्याने केबल्सच्या कामाचा रिपोर्ट मी तुम्हाला देऊ शकले नाही. आता तुम्ही तिकडेच चाललेले दिसताय, तर मीही तुमच्यासोबत येते.”  

मी तिला सांगितले की जेवणानंतरचा फेरफटका आणि इन्स्पेक्शन अश्या दुहेरी हेतूने मी बाहेर पडलो होतो. तिने दिवसभर उभे राहून काम करून घेतले असल्याने, तिने विश्रांती घ्यावी. काम पाहून आल्यावर काही सूचना असल्यास त्या मी तिला दुसऱ्या दिवशी सकाळी देईन. 

“सर, काही चुका झाल्या असतील किंवा तुमच्या आणखी काही सूचना असतील तर त्या जागच्याजागी मला समजतील आणि उद्या काम करणे सोपे जाईल.” असे म्हणत गीताही माझ्यासोबत निघाली. 

मी केबल रूटचे निरीक्षण करण्यात गर्क होतो. गीताला वेळोवेळी काही सूचना देत असलो तरी तिच्याकडे माझे लक्षही जात नव्हते. आमच्या तंबूच्या जवळ आल्यावर माझी परवानगी घेऊन आणि सॅल्यूट करून ती तिच्या तंबूकडे निघाली. 

ती जात असताना प्रथमच माझ्या लक्षात आले की ती जरा लंगडल्यासारखी, पाय वेळावून टाकत होती. मी तिला त्याबद्दल विचारताच ती हसू लागली. मला काहीच कळेना. उत्तरादाखल तिने पाय वर करून मला तिचा बूट दाखवला. तिच्या बुटाच्या तळव्याचा अर्धा भाग टाचेकडून उकलला जाऊन लोंबत होता. 

“सर, आपण निघालो आणि थोड्याच वेळात एका ठिकाणी वाळूत माझा पाय रुतला. मी पाय जोराने खेचला आणि बुटाची ही अवस्था झाली. नशीब, मी आणखी एक बुटांची जोडी आणलीय, नाहीतर उद्या प्रॉब्लेमच आला असता.”

मला आश्चर्यच वाटले, “गीता, माझं लक्ष तर नव्हतंच, पण तू तरी मला तेंव्हाच सांगायचं होतंस.”   

“ठीक आहे सर, एवढा काही मोठा प्रॉब्लेम नव्हता.” असे म्हणून ती  हसत-हसतच निघून गेली. 

मी विचारात पडलो. तिच्या जागी कोणीही, अगदी मी जरी असतो तरी कदाचित, अचानक उद्भवलेली अडचण वरिष्ठांना दाखवून आपल्या तंबूकडे परत वळलो असतो. केबल रूटच्या इन्स्पेक्शनकरिता जाणे म्हणजे काही युद्धजन्य परिस्थिती नव्हती. पण, गीताला ते मान्य नसावे. एक स्त्री असल्याचा गैरफायदा घेऊन, आपण अवाजवी सवलत मागितल्याची शंका चुकूनही आपल्याबद्दल कोणाच्या मनात येऊ नये याकरिता ती अतिशय जागरूक होती.

गीतासारखेच कर्तव्यनिष्ठ आणि समर्पित वृत्तीचे पुरुष अधिकारीही वेळोवेळी माझ्या हाताखाली होते.  आजही त्यांची आठवण येते तेंव्हा मला त्या सर्वांचे गुणच आठवतात.

स्त्री-पुरुष समानता किंवा विषमता याबद्दलचे विचार माझ्या मनाला शिवतदेखील नाहीत.

लेखक : कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त)

मो  9422870294

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मी मतदार — भाग – १ ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? मनमंजुषेतून ?

☆ मी मतदार — भाग – १ ☆ श्री सुनील देशपांडे ☆

मी गोंधळलेला.

पूर्णपणे कनफ्यूज्ड.

मी शिकलेला किंवा

न शिकलेला.

विचार करणारा किंवा

न करणारा.

कसाही असलो, तरी माझ्या हातात काय आहे?

एक तर जे लोक निवडणुकीला उभे आहेत म्हणजे उमेदवार. त्यापैकीच एकाला मत द्यायचा अधिकार आहे किंवा सगळ्यांना नाकारण्याचा अधिकार अलीकडे मिळाला आहे.

परंतु त्याने साध्य काय होणार आहे? वरील सर्व योग्य वाटत नाहीत असे म्हणून मी नोटाला मत दिले तर त्यातून साध्य काय होते ? शेवटी निवडून येणार तो त्यापैकीच कुणीतरी एक. अगदी नोटाला जास्त लोकांनी मते दिली तरी त्या उमेदवारांच्या यादी पैकी कोणी तरी निवडून येणारच.

व्यवस्था अशी हवी की नोटाला सर्वात जास्त मते मिळाली तर जे उमेदवार उभे आहेत ते सर्व उमेदवार पुढील सहा वर्षासाठी कोणतीही निवडणूक लढवण्यासाठी अपात्र ठरतील.

असे झाल्यास स्वतःचे राजकीय करियर सांभाळण्यासाठी उमेदवारांना काळजी घ्यावीच लागेल. कुणी उठाव आणि नॉमिनेशन फॉर्म भरावा असे ऐरे गैरे लोक उभे राहणार नाहीत.

अशी सुधारणा कायद्यात होऊ शकेल काय ? खूप फरक पडेल असे वाटते.

© श्री सुनील देशपांडे

नाशिक मो – 9657709640 ईमेल  : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “असंही घडतं…?” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

??

☆ “असंही घडतं…?” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

वीस वर्षांपूर्वीची गोष्ट.

तेव्हा आम्ही सांताक्रुजला राहत होतो. चर्चगेटला जायचं असेल तर अकरा वाजता च्या लोकलने जात असू. ती अंधेरी वरून सुटत असल्याने तिला (त्याकाळी) फार गर्दी नसे.

त्या दिवशी मी व माझी मैत्रिण निघालो. गाडीत उजव्या बाकाजवळची सीट  मिळाली.

समोर एक बाई होती .तिने गुजराती पद्धतीने साडी नेसली होती आणि घुंगट अगदी खालीपर्यंत घेतलेला होता. तिचा चेहरा दिसतच नव्हता. शेजारी सुमारे पाच व तीन वर्षाच्या दोन मुली होत्या. त्यांच्या अंगावर स्वस्तातले पण नवीन फ्रॉक होते. दोन्ही मुलींच्या हातात  कॅडबरी होती. शेजारी प्लास्टिकच्या पिशवीत बिस्किट होती.

 गाडी सुटली आणि त्या बाईने दोन्ही मुलींना जवळ घेतले. त्यांचे पापे घेतले. मुलींना कुरवाळले…..

आणि जोरजोरात रडायला लागली.  अगदी तारस्वरात ती  रडत होती.

 ” झालं का परत सुरु …गप्प बैस.. काय झालं ग इतकं रडायला…. “

एक बाई तिला रागवायला लागली. आम्हाला काही कळेना..

“अहो सारखी रडते आहे . काय झालय काही सांगत पण नाहीये.  नुसती गळे काढून रडतीय “

 

सगळ्या नुसत्या  तर्क करायला लागल्या..

“कोणी घरी वारलं असेल..”

“नवरा मारत असेल …”

“भांडण झाल असेल…”

” नवऱ्याने सोडलं का काय….”

प्रत्येक जण कारण हुडकत  होतो. खार स्टेशन येईपर्यंत तिचं  रडणं चालूच होतं ….

 

मुलींना प्रथमच इतकी मोठी कॅडबरी मिळालेली असावी. त्या मजेत खात होत्या .

गाडी बांद्राकडे निघाली .थोडावेळ ती गप्प होती. आता परत रडणं सुरू झालं ……

मुलींना सारखी मिठीत घेत  होती. जवळ घेत होती….  कोणी किती रागवलं तरी ती रडायची थांबतच नव्हती. सांगून सांगून बायका दमल्या …तरी तिचं रडणं सुरूच होतं.

….  बांद्रा गेलं तशी ती गप्प झाली शांत झाली .

 

प्रत्येक जण आपापल्या नादात… काही वेळानंतर आम्ही पण दोघी तिला विसरून गप्पा मारायला लागलो.

आम्ही नंतर तिच्याकडे पाहिलंही नाही….. माहीम येईपर्यंत तिचा आवाज बंद होता.

माहीम आले.. उतरणाऱ्या  बायका उतरल्या चढणाऱ्या चढल्या…

मध्ये चार-पाच सेकंद शांत होते……..

… आणि अचानक ती बाई उठली..  प्लॅटफॉर्मवर उतरली. आणि सरळ पळत पळत निघूनच गेली….

 

त्याच क्षणी लोकल पण सुरू झाली….. क्षणभर काय झालं आम्हाला कळलच नाही..

“बाई पळाली … बाई पळाली “

एकच गडबड झाली…

 

“पोलिसांना फोन करा”

“दादरला गाडी गेली की बघू “

“साखळी ओढायची का “

“अशी कशी गेली”

… एकच आरडा ओरडा गोंधळ  सुरू होता….

 

तेवढ्यात कोपऱ्यातून एक आवाज आला …

” ती बाई काळी का गोरी कोणी बघितलेली नाही आपण तिला ओळखणार ही नाही..”

.. अरे बापरे खरंच की ..

शांतपणे ती बाई म्हणाली ….. 

” पोरींना टाकून ती बाई पळून गेली आहे … ..आणि मध्ये आपल्याला काही करता येणार नाही  गाडी चर्चगेटला गेल्यावर बघू “

 

खरचं की पुढच्या प्रत्येक स्टेशनवर गाडी जेमतेम दोन मिनिटं थांबणार तेवढ्यात काय करणार?

सगळ्यांना ते पटले…. प्रचंड भीती कणव…. दोन्ही पोरी तर रडायला लागल्या…

विचारलं ” कुठे राहता? “

“तिकडे लांब “….  एवढेच सांगत होत्या. काय करावं कुणालाच कळेना.

दादर आलं गेलं .

 

मुलींना कोणीतरी सांगितलं ..

“थोड्या वेळाने आई येणार आहे हं…”  त्यामुळे मुली गप्प बसल्या.

 धाकटीला आता झोप यायला लागली होती .ती मोठी च्या मांडीवर झोपली . मोठी रडून रडून शांत झाली होती. बहिणीच्या अंगावर हात टाकून बसली होती .

… विलक्षण करूण असं दृश्य होतं. अक्षरशः आमच्या सगळ्यांच्या डोळ्यांना धारा लागल्या होत्या .

 

“अशी कशी ही आई …” एवढच म्हणत होतो..

स्टेशन येत होती जात होती..

एक बाई म्हणाली….. 

” मी वकील आहे. मुलींना मी पोलिसांच्या ताब्यात देईन. माझ्याबरोबर तुमच्यापैकी कोणीतरी चला.”

 

“पोलीस ”  ….म्हटल्यावर आधी सगळ्यांचे चेहरे घाबरले. नंतर आम्ही सगळ्याच तयार झालो. चर्चगेट जवळ आलं तसं त्या छोटीला उठवलं .दोघींनी त्यांचे हात धरले.

त्या सारख्या म्हणत होत्या … ” मला आई पाहिजे..  मला आईकडे जायचंय .. आईकडे नेणार ना…”

“हो हो “….असं सांगितलं … त्या दोघींना खाली उतरवलं.

 

पोलिसांशी त्या वकिलीण  बाई बोलत होत्या.  मुलींना बाकावर बसवलं होतं…  इतरही आम्ही बऱ्याच जणी होतो…  मुलींना वाटत होतं  .. ‘ आई येणार आहे…  बिचार्‍या ….आईची वाट पहात  होत्या…

“आई कधी येणार ? आई कुठे आहे ?” असं सारखं विचारत होत्या. कितीतरी वेळ आम्ही तिथे होतो

 

आता या मुलींचं काय होणार… या विचाराची सुद्धा भीती वाटत होती. डोळे अक्षरशः  आपोआप वाहत होते… आम्ही मूकपणे  उभ्या होतो .

या मुलींना परत आई कधीही भेटणार नव्हती…. याचे आम्हाला प्रचंड दु:ख वाटत होते.

 

काही वेळानंतर दोन महिला पोलीस आल्या आणि मुलींना घेऊन निघाल्या.

त्या  दोघी लांब  जाईपर्यंत आम्ही बघत होतो …… 

 

या मुलींचे भवितव्य  काय असेल..

मुलींचा काय दोष…

 मुली म्हणून सोडून दिल्या का…

मुलं झाली असती तर सांभाळली असती का ?

मग मुलींना का टाकलं?

… अनेक अनुत्तरित प्रश्न  मनात उमटत होते….

 

या घटनेला इतकी वर्ष झाली तरी त्या मुली आठवल्या की माझे डोळे अजूनही भरून येतात.

आज कुठे असतील त्या मुली….. 

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈