मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ तांबड्या माठाची भाजी… भाग – १ ☆ सुश्री नीला महाबळ गोडबोले ☆

सुश्री नीला महाबळ गोडबोले

??

☆ तांबड्या माठाची भाजी… भाग – १ ☆ सुश्री नीला महाबळ गोडबोले

” नीले, उद्या मी आणि आप्पा येतोय सोलापुरला.. येताना काय आणू मिरजेहून? ” – वहिनीचा खणखणीत आवाजातला प्रश्न..

आप्पा म्हणजे खरंतर प्रशांत, माझा एकुलता थोरला भाऊ… पण त्याकाळच्या पद्धतीला तंतोतंत अनुसरून… चुलत नि सख्ख्या भावांना अनुक्रमे तात्या, भाऊ, अण्णा, आप्पा, आबा अशी संबोधनं बहाल केलेली.. आप्पाची बायको स्वाती.. माझी वहिनी.. आईबाबांनंतर या दोघांनी माझं मातृ-पितृत्त्व स्वत:कडे घेतलेलं… म्हणूनच प्रत्येकवेळी माझ्याकडे येताना हा प्रश्न… उपचारापुरता…

खरंतर बसाप्पाची बर्फी, पेढे, खाजा, चुरमुरे आणि भलीमोठी ताजी भाजी त्यांच्याबरोबर येणार.. हे ठरलेलं..!! .. “ बाकी काही नको… फक्त लालमाठ आण”

दुसरे दिवशी हिरवीगार मेथी, कोवळा शेपू, पातळ पानांचा चाकवत, लालबुंद गाजरं, फिकट हिरव्या रंगावर पांढऱ्या नक्षीने सजलेली कृष्णाकाठची कोवळीझार वांगी नि लाल डाळिंबी रंगांची कोवळी पानं ल्यालेला ” तांबडा माठ ” अशा ” अवघ्या विठाई ” नं माझं स्वयंपाकघर उजळून निघालेलं…!!

” नुसतं बसणं म्हणजे पाप ” या विचारावर ठाम असलेली माझी वहिनी ” भाज्या निवडूनच ठेवूया लगेच ” म्हणत फरशीवर मांडी ठोकून बसलेली… — नि माझं मन केंव्हाच चाळीस वर्षे उलटा प्रवास करून मिरजेच्या घरात आईला शोधत पोहोचलेलं..!!

अगदी बाळबोध दिवस होते ते! – – आपलं घर, आपली माणसं, आपलं गाव, शाळा, मैत्रिणी, नातेवाईक.. लग्नकार्य, फक्त सुट्टीत गावाला म्हणजे मामा, मावशीकडे जाणं… एवढं चिमुकलं विश्व.. आनंदाच्या आकाशगंगेतलं!!

सकाळचा नाष्टा असा नसायचाच… असायचं ते खाणं… तेही भूक लागलेली असेल तरच… शिळ्या भाताचा तव्यावर परतलेला फोडणीचा भात, शिळ्या पोळीचा गूळ, तूप घातलेला लाडू किंवा कांदा घालून केलेली फोडणीची पोळी, आदले दिवशीची भाकरी उरलेली असेल तर दही, दूध, खाराची मिरची घालून केलेला दहीकाला, दहीपोहे, दूध पोहे, नागपंचमीच्या आसपासचे दिवस असतील तर दूध-लाह्याचं पीठ, भाजकी कणिक नि दूध आणि अगदीच काही नसेल तर आईनं करून ठेवलेला किंवा कुणाकडून तरी आलेला एखादा रव्याचा, बेसनाचा, राजगि-याचा लाडू..!!

पोरावळ, आलं गेलं, कामाच्या रगाड्यात अक्षरश: पिचलेल्या आयांची मजल यापलीकडे जाऊच शकायची नाही.. उद्या ब्रेकफास्टला काय करावं याचा विचार करणारी आजची स्टायलीश आई आणि इडली-सांबार, मेदूवडे, डोसे, पराठे, ऑम्लेट्स, सॅंडविचेस, ओट्स, उपमा, पोहे, फ्रूट्स, फ्रूट्स ज्युसेस असे अनंत पदार्थ काचेच्या टेबलावर मांडून मुलांना खाण्याचा आग्रह करणारी नि इडली आवडत नाही तर ऑम्लेट खा.. असं गोडीने विनवणारी मेकअप नि सुंदर कपड्यातील ती नाजुकशी आई टी. व्हीवर पाहिली की मला अक्षरश: रडू येतं… नि वाटतं ” अशीच आमुची आई असती तर…? “

” जे घरात आहे ते खायचं!! ” या ब्रिदवाक्यावर नि ” नाही खाल्लं एखादे दिवशी तर लगेच काही मरत नाही ” या प्रबळ विश्वासावर आमच्या काळच्या आयांनी आमचं संगोपन केलं… म्हणूनच ” मुलं भाज्या खात नाहीत तर काय करू? ” असले प्रश्न आमच्या आयांना कधी पडले नाहीत. आणि ” पराठे, कटलेट्स, थालीपीठ, वडे असे पदार्थ करून त्यांत न आवडणा-या भाज्या घाला ” अशी उत्तरंही कधी मिळाली नाहीत.

” भूक लागली की मुलं आपोआप खातात नि एखादं जीवनसत्त्व कमी पडलं ते मिळवण्यासाठी शरीर आपोआप ते जीवनसत्त्व असलेल्या भाज्या, फळं मागून घेतं..!! “.. या आई -आजीच्या सल्ल्यावर नि निसर्गाच्या कर्तृत्त्वावर श्रद्धा ठेवून मुलांना वाढवणा-या आमच्या आयांच्या विश्वासाला आमच्या पिढीनेही तडा जाऊ दिला नाही.. बोर्नव्हिटा, कॉम्पलान किंवा सप्लीमेंट्स न घेताही आमची छान वाढ झाली!!

अमावस्या, पौर्णिमेला पोळी… इतरवेळी रोज भाकरी… यात डाएट किंवा कॅलरीच्या हिशोबाचा गंधही नव्हता.. ज्वारी स्वस्त होती नि भाकरीला तेल लागायचं नाही… एवढ्याच आर्थिक हिशेबात बसणारं हे पोळीभाकरीचं गणित महिना कमी खर्चात पार पाडायचं!

डावीकडे शेंगा, जवस, लसूण, कारळे यांची सुकी चटणी, सणावाराला ओल्या खोब-याची चटणी, पाहुणे आले तर वर्षभरातील साठवणीतलं लिंबू, कैरी, मिरची यांचं लोणचं, काकडी/गाजर/बीट/कोबी यांची कोशिंबीर-कधी दह्यातली तर कधी लिंबू पिळून, कधी भोपळ्याचं नाहीतर वांग्याचं भरीत, वांगी/गवार/.. घेवडा/ कोबी/भोपळा/पडवळ/ तोंडली/कारली/दोडका इ. पैकी भाजी, आमटी/कढी आणि भात… नेहमी साध्या जाड्या तांदुळाचा आणि सणावाराला इंद्रायणी किंवा आंबेमोहराचा..

भातावर, पोळी -भाकरीवर आमची आई तूप मात्र आवर्जून वाढत असे… जेवणानंतर ताक न चुकता…

बाकी लोण्या-दह्याचे चोचले फक्त बाजरीची भाकरी, चकली, थालीपीठ, धिरडी यांपुरते!! उप्पीट, शिरा, पोहे, धिरडी, थालिपीठे, उकड.. हे पदार्थ संध्याकाळच्या खाण्यासाठी राखून ठेवलेले… पण मर्यादित… एखादी बशी भरून…

भाकरी, पालेभाज्या, पिठलं नि मूगडाळीची खिचडी रात्रीला आंदण दिलेली..

पक्वान्ने, मसालेभात, असे चविष्ट पदार्थ नि भजी पापडांसारखे तळणाचे पदार्थ सणा-समारंभांपुरते… जिभेच्या चोचल्यांसाठी नाहीत..

साबुदाणा खिचडी, बटाट्याचा चिवडा, राजगिरा लाडू, खजूर, शेंगदाण्याचा लाडू, केळी, चिक्कू, सफरचंदासारखी फळे.. दही, यांची बेगमी उपवासापुरती… एकादशी, महाशिवरात्र नाहीतर आई, आजीच्या उपवासादिवशी मिळणा-या चार चमचे साबुदाण्याच्या खिचडीची चव दिवसभर जिभेवर रेंगाळायची..

आईच्या नाजुक हातांनी भरवलेला मऊ गुरगुट्या गरम गरम मेतकूट-भात नि लिंबाचं लोणचं, लापशी, मऊसर सांजा, साजुक तुपातला शिरा, घसा शेकून देणारी उकड, तोंडाला चव यावी म्हणून कमी तेलातलं भरपूर लसूण घातलेलं धिरडं, खडीसाखर, काळे मनुके, मोसंब्याचा रस फक्त आजारपणात… म्हणूनच “पडू आजारी मौज हीच वाटे भारी “

इतर वेळेला मात्र शाळेत जाताना गडबडीत कसाबसा बोटांना पोळत तोंडात कोंबलेला वरण भात नि डब्यातली थंडगार पोळी नि गोळा झालेली, अनेकदा दप्तराला नि वह्या पुस्तकांना तेलाने अंघोळ घालणारी भाजी… नि लोणचं!

आईनं डबा भरून करून ठेवलेला पातळ पोह्याचा चिवडा, भडंग… कुठल्यातरी देवापुढे फोडलेल्या नारळापासून बनवलेले रव्याचे लाडू, नारळाच्या वड्या नाहीतर… बेसनाचे लाडू…

आई गावाला गेलेली असताना आम्ही दोघी बहिणींनी बनवलेले तेल, तिखट, मीठ लावलेले पोहे किंवा चुरमुरे… किंवा चुरमु-यात कांदा, कोथिंबीर नि चिंचेचं पातळ पाणी घालून केलेली नि आम्ही तिघा भावंडांनी मिटक्या मारत खाल्लेला तो भेळ नामक आंबटचिट्ट दिव्य पदार्थ (फरसाण, शेव विरहित)

अशा या नीरस खाद्ययात्रेमुळेच आम्हाला चिवडा, चकली, लाडू, अनारसे, शेव नि दिवाळी संपल्यावर बनणा-या मिसळीमुळे दिवाळीचे वेध लागत..

कधीतरीच होणारा मैत्रिणीचा वाढदिवस, वर्षातून एखाद-दुसरं होणारं कुणाचं तरी लग्न, पाहुण्यांकडची सुट्टी, घरातले सण-समारंभ अगदी श्राद्ध -पक्ष सुद्धा… यांचं फार आकर्षण वाटे … कारण या दिवशी वेगळ्या चवीचे, वेगळे खाद्यपदार्थ थोड्याशा चमचमीत स्वरूपात खायला मिळत…

हॉटेलच्या चमचमीत, चवदार चवीची चटक लागलेल्या नि कधीतरीच घरचं अन्न खाणा-या आजच्या पिढीला आमचं हे आकर्षण समजणारच नाही…

भरपूर आलं- लसूण, कोथिंबीर, मिरचीचं वाटण घालून केलेला बटाटा, फ्लॉवरचा रस्सा, भरली वांगी, डाळकांदा, वरणफळं किंवा चकोल्या, दगडासारखी झालेली असली तरी वेगळ्या चवीची इडली, तव्याशी झटापट करून तुकड्या-तुकड्याची गॅंग म्हणून जन्म घेणारा तथाकथित डोसा, टोमॅटो सार, केवळ भाज्या घातल्या आहेत म्हणून ज्याला पुलाव म्हणायचं असा बेचव भात… अशा पदार्थांनीही आमच्या ओसाड खाद्यजीवनात मरुस्थळं फुलवलेली आहेत…!!

रोजच्या पोळी भाकरी, भात, आमटीच्या त्याच त्याच चक्रात एकच गोष्ट वेगळेपणा आणायची –ती म्हणजे भाजी! रोजचं जेवणं बाकी सगळं तेच भाजी मात्रं वेगळी!!

त्या काळची भाजीही त्या काळासारखी शुध्द असे.. स्वत:ची चव, स्वत: चा रंग, स्वत:चा स्वाद.. स्वत:चं अस्तित्त्व राखणारी… आजच्या पंजाबी भाजीसारखी स्वत:ला कांदा, लसूण, आलं, टोमॅटो, काजू यांच्या ग्रेव्हीत स्वत:ला समर्पित करून स्वत:ची ओळख संपवणारी नव्हे किंवा सोया-टोमॅटो किंवा व्हाईट सॉस, चीज अशा चिकचिकाटात स्वत:ला गुरफटवणारी चायनीज किंवा कॉंटिनेंटलही नाही…

कढईत टाकली की अख्ख्या गल्लीभर बातमी पसरावी अशी शेपूची भाजी मग ती डाळ घालून केलेली असो, पीठ पेरूनची असो नाहीतर वरणातली… माझ्यासारखा शेपू आवडणारा भाकरी नि शेपूच्या भाजीवर ताव मारेल किंवा न आवडणा-याला त्या दिवशी उपवास घडेल..

तुरट चवीचा नवलकोल… पादवायुसारख्या वासाचा.. तोही कुणाला तरी आवडणारा..

डाळ घालून कोबीची भाजी नुसतीही खावी अशी..

भरपूर ओल्या खोब-यातल्या मिरची, आलं घालून केल्या फ्लॉवरच्या भाजीला पोळीशिवाय मजा नाही.

भाजणी पेरून केलेली असो किंवा वाल घालूनची असो… पडवळाची भाजी मला आवडतेच..

श्रावणघेवड्याला मटकी नि आमसूल हवेच… पण त्याची लिंबू, ओले खोबरे घालून पचडी सरस…

गवारीला ओव्याशिवाय स्वाद नाही नि लाल भोपळ्याला मेथीशिवाय गंध नाही..

दुधीची भाजी ही निव्वळ फसवणुक आहे.. पण त्याच्या कापाला मात्रं तोड नाही..

भेंडी लहान मुलांना का आवडते, हे एक मोठं कोडं आहे..

दुस-याच्या मदतीशिवाय पानही न हलणारं वांगं.. मात्र त्यात भरलेल्या मसाल्यामुळे मिरवून घेतं.. कांदा, मसाल्यामुळे भरीताच्या रुपात आवडून जातं नि डाळवांगं म्हणूनही भाव खातं.. नशीबवान कार्टं..!!

पीठ पेरून असो, डाळ घालून असो नाहीतर गोळा भाजी असो.. पोळीबरोबर किंवा भाकरीबरोबर… मेथी स्वत:च्या गंधाची पदोपदी जाणीव देत असते.. अगदी दुसरे दिवशीपर्यंत…

– क्रमशः भाग पहिला

© सुश्री नीला महाबळ गोडबोले 

सोलापूर 

फोन नं. 9820206306,  ई-मेल- gauri_gadekar@hotmail. com; gaurigadekar589@gmail. com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “माझी दिनदर्शिका – My Calendar…” भाग – २ ☆ श्री सुधीर करंदीकर ☆

श्री सुधीर करंदीकर

??

☆ “माझी दिनदर्शिका – My Calendar…” भाग – २ ☆ श्री सुधीर करंदीकर

(यावरून मनवाला गाडी विकण्याकरता काय काय सोपस्कार करावे लागले असतील, हे सहज लक्षात येईल. माझी दिनदर्शिका जर असती, तर असे प्रसंग खूपच सोपे नक्कीच होतात.) 

इथून पुढे – – –

आजकाल बहुतेकांकडे एक पेक्षा जास्त गाड्या असतात. कुठल्या गाडीचे पीयूसी कधी ड्यू आहे, हे लक्षात ठेवणे नक्कीच सोपे नाही. रस्त्यावर पीयूसी तसे फार कमी वेळा पोलिसांकडून चेक होते, आणि आपण कधी वेळेवर, कधी उशिरा असे ते करतच असतो. पण केंव्हातरी आपले पीयूसी नाही आणि रस्त्यावर पीयूसी चेक होणे, अशी सांगड घडते आणि आलीया भोगासी म्हणत १००० रु दंड भरावा लागतो. माझी दिनदर्शिका जर असती, तर असा दंडाचा प्रसंग कधी येणार नाही, हे नक्की.

अशी ही यादी खूप मोठी होणार, हे यावरून सहज लक्षात येते.

काय आहे ही माझी दिनदर्शिका किंवा My Calender?

नवीन वर्ष सुरु झाले, कि २ – ३ तरी कॅलेंडर आपल्या कडे येतातच. त्यापैकी जरा मोकळी जागा असलेले मोठे कॅलेंडर आता माझी दिनदर्शिका किंवा My Calender म्हणून आपण तयार करायचे आहे.

वर्षभरात काय काय महत्वाच्या गोष्टी करायच्या आहेत, कुठली कुठली पेमेंट करायची आहेत, आणि त्यांची काय तारीख आहे, हे बघून कॅलेंडर वर त्या त्या महिन्याच्या पानावर तशी एंट्री करायची आहे.

साधारणपणे सगळ्यांनाच लागू असणाऱ्या गोष्टी अशा असू असतात –

*घराचा कार्पोरेशन टॅक्स भरणे * सगळ्या वाहनांची पीयूसी ड्यू डेट *सगळ्या वाहनांची इन्शुरन्स ची ड्यू डेट 

*मोबाईल रिचार्ज ची ड्यू डेट *मेडिकल क्लेम करण्याच्या तारखा *टाटा स्काय इ. चे रिन्यू करणे

*डॉक्टरांच्या अँपॉईंटमेंट्स / मेडिकल चेक अप च्या तारखा (स्वतःच्या, बायकोच्या / नवऱ्याच्या, घरातल्या इतरांच्या)

*इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करणे (स्वतःचे, बायकोचे / नवऱ्याचे ऍज अप्लिकेबल)

* टीडीएस सर्टिफिकेट / इंटरेस्ट सर्टिफिकेट आणणे

*80 C खाली टॅक्स रिबेट घेण्याकरता पीपीएफ वगैरे मध्ये पैसे भरणे / डोनेशन्स देणे 

*बँकेमधे पीपीएफ खाते असेल, तर ते सुरु ठेवण्याकरता दरवर्षी काही थोडी रक्कम भरावी लागते 

*जिवंत असल्याचा दाखल घेणे आणि एलआयसी / बँक / ऑफिस इ ठिकाणी जमा करणे

*बँक किंवा इतर कुठल्या एफडी मॅच्युअर होत आहेत का?

*एमएसीबी चे बिल / लँड लाईन चे बिल / पेपर बिल / दूधबिल / घरात कामाला येणाऱ्यांची पेमेंट्स / —-

प्रत्येकाच्या व्यापाप्रमाणे हि यादी लहान / मोठी होणार, हे आलेच.

समजा आपल्या गाडीच्या इन्शुरन्स ची तारीख २० एप्रिल आहे. एप्रिल महिना सुरु झाला. आपण कॅलेंडर चं पान उलटलं, कि समजेल ड्यू डेट २० एप्रिल आहे. आपण त्याप्रमाणे रिन्यू केले आणि आता पुढची रिन्यूअल डेट पुढच्या वर्षीच्या २० एप्रिल ला असणार. आता अशा नोंदी डिसेंबर च्या पानावर मोकळ्या जागेत करून ठेवायच्या. आणि कॅलेंडर बदललं कि त्या कॅरी फॉरवर्ड करायच्या.

काही महत्वाच्या गोष्टी किंवा काही पेमेंट ही काही वर्षांच्या गॅप नंतर करायची असतात. जसे –

*ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू (आपले / बायकोचे – नवऱ्याचे / –)

*वाहनांचे रजिस्ट्रेशन रिन्यू करणे * डेबिट कार्ड / क्रेडिट कार्ड च्या एक्सपायरी डेट्स 

*म्युचवल फंड बंद करणे वगैरे *घर भाड्यानी दिले / घेतले असल्यास रीतसर भाडेकरार 

*पासपोर्ट / व्हिसा रिन्यू करणे (आपला / बायकोचा – नवऱ्याचा / –) * आधार कार्ड / पॅन कार्ड मधे काही बदल करणे

प्रत्येकाच्या व्यापाप्रमाणे आणि आवाक्याप्रमाणे हि यादी पण लहान / मोठी होणार, हे आलेच.

हे करतांना ही सगळी ओरिजिनल डॉक्युमेंट्स दरवर्षी वर्षाच्या सुरुवातीला आपल्याला बघायचीच आहेत, आपल्या नजरेखालून घालायची आहेत आणि आवश्यकतेप्रमाणे तशी कॅलेंडर वर नोंद करायची आहे.

सिनियर सिटिझन्स यांच्याकरता अजून एक महत्वाची गोष्ट काही वर्षांच्या गॅप नंतर जरूर बघायची आहे / रिव्ह्यू करायची आहे, आणि ती म्हणजे आपले मृत्युपत्र म्हणजे विल आणि निरनिराळ्या इन्व्हेस्टमेंट्स / मालमत्ता या करता दिलेली नॉमिनेशन्स. बदलत्या परिस्थितीप्रमाणे यामध्ये वेळोवेळी बदल करणे गरजेचे असू शकते. काही वेळा बँकांची सॉफ्टवेअर बदलतात आणि त्या प्रोसेस मध्ये दिलेली नॉमिनेशन्स गायब होतात. काही गृहरचना संस्थांमध्ये माणूस गेल्यावर लक्षात येते, कि, नॉमिनेशन भरलेला सही / शिक्का असलेला फॉर्म घरी पण नसतो आणि सोसायटीच्या दप्तरात पण नसतो. मृत्युपत्र बऱ्याच जणांनी केलेलेच नसते किंवा केलेले असले, तर कुठे ठेवले आहे ते घरच्यांना माहित नसते. अशा घटना घडलेल्या आहेत, आणि नंतर पुढे काय होते, ते सांगायला नको. काही वर्षांपूर्वी सत्तरी नंतर सगळ्यांना वाटायचे, कि आता आपले खरे नाही, मृत्युपत्र वगैरे करायला पाहिजे. “आपले खरे नाही” असे वाटण्याचे वय आता चाळीशी – पन्नाशी पर्यंत खाली आले आहे. थोडक्यात म्हणजे हि कागदपत्रे सगळ्यांनीच करणे गरजेचे आहे. आणि मधून मधून रिव्ह्यू करणे पण गरजेचे आहे. आणि हे करतांना आपल्या जोडीदाराला विश्वासामधे घेणे गरजेचे आहे. आणि अशा रिव्ह्यू करता उपयोगी येणार आहे, माझी दिनदर्शिका.

माझी दिनदर्शिका किंवा My Calender मध्ये अजून एक महत्वाची नोंद करायची आहे आणि ती म्हणजे आपल्या जवळच्यांचे आणि परिचितांचे वाढदिवस आणि लग्न झालेले असल्यास लग्न दिवस. आजकाल फेसबुक आणि व्हॉटस्अप मुळे तांत्रिक शुभेच्छांची देवाण घेवाण यांत्रिक पद्धतीने आपोआपच सुरु होते. पण यामध्ये आपले सगळेच जण कव्हर होतील असे जरूर नाही. आपल्या कुठल्याही ग्रुपमध्ये बायकोचे नाव असेलच, असे काही जरूर नाही. आणि तो वाढदिवस आणि तो लग्न दिवस विसरून पण चालत नाही. म्हणून नवीन कॅलेंडर आले, कि त्यावर या सगळ्या नोंदी करून ठेवायच्या, आणि त्या त्या दिवशी फोन करून / मॅसेज करून आपल्या मनातल्या शुभेच्छा दुसऱ्यांपर्यंत पोहोचवायच्या.

कुणाकडे चालू महिन्यात किंवा काही महिन्यांनंतर डोहाळ जेवण आहे / लग्न आहे / बारसं आहे / काही कार्यक्रम आहे, अशा नोंदी आपण माझी दिनदर्शिका मध्ये करायच्या आहेत. कुठले गाण्यांचे कार्यक्रम / नाचांचे कार्यक्रम / मुलांच्या शाळेचे कार्यक्रम, अशा नोंदी पण आपण My Calender मधे करायच्या आहेत.

आजकाल सगळेच जण हेल्थ कॉन्शस असतात, वजन कॉन्शस असतात, वगैरे वगैरे. त्याकरता आठवड्यात ५ दिवस फिरायला जाणार, ३ दिवस व्यायाम करणार, खाण्यावर काही बंधने, पिण्यावर पण काही बंधने, असे बरेच संकल्प आपण वर्षाच्या सुरवातीला करतो. आणि पुढे त्याचे काय होते, हे आपण जाणतोच. आता या सगळ्या नोंदी My Calender वर केल्या तर, “जे ठरवले – ते पूर्ण केले”, म्हणजेच संकल्पपूर्ती ही स्टेज गाठणे सहज शक्य आहे.

कुणाला असंही वाटू शकतं, कि या सगळ्या नोंदी थोड्या कॉन्फिडेन्शियल आहेत आणि सगळ्यांना दिसू नयेत. या करता माझी दिनदर्शिका आपल्या बेडरूम मधे लावता येते आणि हॉल मध्ये येणाऱ्या जाणाऱ्यांना आवडतील अशी सुंदर सुंदर चित्र असलेलं कॅलेंडर लावता येते.

पहिलं कॅलेंडर करायला थोडा वेळ लागणार, हे नक्की. पण पुढची कॅलेंडर तयार करणे खूप सोपे असणार आहे, कारण थोडे छोटे मोठे बदल करत, मागचीच ‘री’ पुढे ओढायची, इतके हे काम सोपे असणार आहे, हे नक्की. पाहिली माझी दिनदर्शिका किंवा My Calender भिंतीवर लागलं, कि घरातले सगळेच म्हणू शकतील —

I simply can not miss any event in the year because I have “My Calender”.

मी वर्षातली कुठलीही घटना विसरणे, हे अशक्यप्राय आहे, कारण माझ्याकडे आहे “माझी दिनदर्शिका”.

– समाप्त –

© श्री सुधीर करंदीकर

मो. 9225631100 – ईमेल – srkarandikar@gmail. com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ तिळगुळ समारंभ… ☆ सुश्री संध्या बेडेकर ☆

सुश्री संध्या बेडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ तिळगुळ समारंभ… ☆ सुश्री संध्या बेडेकर ☆

आमच्या बिल्डिंगचा तिळगुळ समारंभ छान झाला. या आठवड्यात संक्रांतीचे हळदीकुंकू म्हणून बऱ्याच जागी बोलविले होते. काळया रंगाच्या साड्यांना अगदी बहर आला होता. काळया रंगाची पैठणी पासून ते विविध प्रकारच्या साड्या बघायला मिळाल्या. ••••

काही जणींचा ड्रेसिंग सेन्स खूप छान असतो. प्रसंगानुरूप परिधान, त्यावर मॅचिंग इतर Accessories घालून त्या छान तयार होतात. व‌ स्वतः ला छान carry करतात. अशा स्टायलिश बायका नेहमीच आकर्षणाचे केंद्रबिंदू असतात. याकरिता आवड पाहिजे, ती समज पाहिजे, हौस तर असायलाच पाहिजे. व सर्व व्यवस्थित करताही आले पाहिजे. •••••

मला अशा बायका खूप आवडतात. आपला स्त्री म्हणून ‘सजण्याचा ‘ जन्मसिद्ध अधिकार त्या व्यवस्थित उपयोगात आणतात. स्त्री जन्माचा आनंद भरपूर उपभोगतात. मला नेहमीच कौतुक वाटतं त्यांचे. •••• 

आज अनिता कडे हळदीकुंकू आहे. आमच्या बिल्डिंगच्या सर्वच मैत्रिणीना आमंत्रण आहे. रेहाना व तिच्या सासूबाई. पल्लवी आपल्या सासूबाईं बरोबर, जोशी काकू, कुलकर्णी काकू आल्या. तसेच अजून अशाही बर्याच बायका होत्या ज्या आपल्या आयुष्याच्या प्रवासात आता एकट्याच आहेत. त्यांचे जोडीदार त्यांना सोडून गेले आहेत. प्रकृतीचा नियमच आहे तो. मानावाच लागतो. कोणी आधी कोणी नंतर साथ सोडणार हे आधीच ठरलेलं असते. •••प्रकृतीच्या नियमाप्रमाणे वागावेच लागते. पण याचा अर्थ आयुष्याचा आनंद कमी करणे नव्हे. नेहमी आनंदी राहण हा प्रत्येक स्त्री पुरुषाचा जन्मसिद्ध अधिकार आहे. ••••

म्हणतात ना ••••

“जीवन तब कठिन लगता है, जब हम स्वयं को बदलने की बजाय परिस्थितियों को बदलने का प्रयास करते‌ हैं।”•••

अनिता तशी अगदी साधी मुलगी. फॅशन, स्टाईल तिच्या आसपासही फटकत नाही. पण विचारांनी खूप श्रीमंत व आधुनिक. नेहमी काही तरी वेगळा विचार करणार. •••••

आज हळदीकुंकवाला तिने सर्वांना आग्रहाने बोलविले होते. रेहाना, पल्लवी च्या सासूबाई म्हणाल्या पण ••••अग आम्ही येऊ पुन्हा कधी. आज तुम्ही सर्व मुली enjoy करा. आज हळदीकुंकवाच्या निमित्ताने तुम्ही सर्व किती तरी दिवसांत भेटणार अहात तेंव्हा मजा करा. पण अनिता कुठे ऐकते कोणाचे?? तीने सर्वांना संध्याकाळी चार वाजता यायचा आग्रह ‌केला. ••••

सर्व जण पाच दहा मिनिटांच्या अंतरावर पोचल्याच. आज अनिता च्या मुलाचे ‘बोरन्हाण ‘ चा कार्यक्रम ही आहे. अनिता ने रेहाना च्या सासूबाई, आम्ही सर्व त्यांना ‘अम्मी’ म्हणतो. त्यांना मदतीला घेतले. सर्व ‘आजी पार्टी ‘ ला मागे अर्ध गोलाकार पद्धतिने बसविले व त्यांच्या समोर अनयचा ‘बोरन्हाण’ कार्यक्रम केला. मुलांनी मनसोक्त लूटालूट केली. •••••

माझ्या मुलाला सर्व आजींचे खूप खूप आशिर्वाद मिळु दे असं म्हणाली अनिता. ••

अनिताचे विचार म्हणजे सकारात्मक शक्ति. सर्वांना एकत्र घेऊन कसे पूढे जायचे??? हे ती उदाहरणासह प्रस्तुत करते. ते ही एकदम ‌‌confidently, सहजतेने. तिच्या विचारांनी दुसऱ्यांना वेगळा विचार करण्याची प्रेरणा मिळते. सुरवात नेहमी स्वतः पासून करायची हेही ती दाखवून देते. एकत्र असणं हा एक सामुहिक आनंद आहे. तो घेता व देता आला पाहिजे. ••••

“खुशी देना ही खुशी पाने का अधिकार है”।”

“आनंद हा संसर्गजन्य रोग, जेवढा जास्त पसरविता येईल तेवढा पसरविता आला पाहिजे. ” थोड्या ‘हटके चालीरीती’ सहज सुरू करता आल्या पाहिजेत. ••••

गृप मधील आधुनिक परिधानात आलेल्या बायका कडून ही खूप शिकता येते. नवीन फॅशनस कळतात. ती एक कलाच आहे सर्वांना नाही जमत. पण त्यांना बघून शिकता नक्की येते. आधुनिक विचार ही कळतात. सध्या कोणत्या फॅशनस ‘IN ‘आहेत तेही कळत. •••••

एकंदरीत हळदीकुंकू म्हणजे जूनी संस्कृती, संस्कार आहेतच. बरोबर एकत्र येणे, भेटणे, गप्पा मारणे, आपल्या दोस्ती ला मजबूत करणे, वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करणे, म्हणजे गम्मत जम्मतच. काही तरी नवीन शिकणे पण होते. अनिता सारखा वेगळा विचार करता आला पाहिजे. व तो कृतितही उतरवता आला पाहिजे. प्रसंगानुसार आपला विचार अमलात आणता आला पाहिजे. तो सहजपणे प्रस्तुत करता आला पाहिजे. जास्त काही न बोलता सर्वांसमोर आदर्श ठेवता आला पाहिजे. ••••

काही गोष्टीं / विचार बदलणे गरजेचे आहे. फक्त बोलून आपले विचार सांगणारे खूप लोक असतात. पण एक पाऊल पूढे येऊन ते कृतित उतरविण्यारे कमी असतात. सकारात्मक बदल करणे म्हणजेच प्रगती करणे होय. ••••

हळदीकुंकू छान झाले. जोशी आजींनी संक्रांतीचे महत्त्व सांगितले. त्याबद्दल माहिती दिली. नंतर अत्तर, गुलाबपाणी, चाफ्याचे फूलं, तिळगुळ, बोर शेंगा असलेली ओटी, व वाण म्हणून तुळशी रोप. अगदी आनंदाने विचारांनी समृद्ध होऊनच मी घरी परतले.

अशा प्रकारे तिळगुळ समारंभ छान संपन्न झाला. •••••

लक्षात आले, •••

“वाणी और विचार ये दोनों प्रोडक्ट हमारी खुद की कंपनी के होते हैं।

जितनी क्वालिटी और गुणवत्ता अच्छी रखेंगे उतनी ही उनकी कीमत ज्यादा बढेगी । “

” We always work for better tomorrow. Let’s work for better today “.

© सुश्री संध्या बेडेकर 

वारजे, पुणे. 

7507340231

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “माझी दिनदर्शिका – My Calendar…” भाग – १ ☆ श्री सुधीर करंदीकर ☆

श्री सुधीर करंदीकर

??

☆ “माझी दिनदर्शिका – My Calendar…” भाग – १ ☆ श्री सुधीर करंदीकर

मित्रमैत्रिणी, नातेवाईक, सहकारी, आणि काही खास खास जणांकडून आलेल्या नव वर्षाच्या शुभेच्छांमुळे सगळ्यांचेच हे चालू झालेले नवे वर्ष छानच सुरु झालेले असणार. नवीन वर्ष सुरु झालं, कि, सगळ्यांच्याच घरामधल्या एक – दोन भिंतींची, “आता जुने कॅलेंडर काढा आणि नवीन येऊ द्या” अशी कुणकुण सुरु होते. कालनिर्णय सारखी कॅलेंडर बाजारात विकत मिळतात, त्यांना खूप मागणी असते. यामध्ये मराठी महिन्यांची पण संपूर्ण माहिती असते, त्यामुळे आपले सणवार, तिथी वगैरे बघता येते. बहुतेक बँकांची आणि काही कंपन्यांची पण छान छान कॅलेंडर असतात आणि त्यापैकी पण काहींमध्ये आपले सगळे सणवार दिलेले असतात. नवीन वर्ष सुरु झाल्यानंतर साधारण पहिल्या १० – १५ दिवसांमधे सगळ्यांच्या घरात जुनी कॅलेंडर जाऊन नवीन आलेली असतात. कॅलेंडरची ऍलर्जी असणारी पण काही घरे असतात. काही घरांमध्ये नवीन कॅलेंडर लावण्याचा उत्साह खूप असतो, पण ३ – ४ महिने उलटले, कि कॅलेंडर कुठला महिना दाखवत आहे, आणि कुठला महिना चालू आहे, यांचा काही ताळमेळ नसतो. हा लेख वाचल्यानंतर सगळेच कॅलेंडरच्या बाबतीत सतर्क होतील, हे मात्र नक्की.

कॅलेंडरचं चालू महिन्याचं पान समोर आलं, कि, या महिन्यात एकादशी कधी आहे? चतुर्थी कधी आहे? असे उपास करण्याचे दिवस समजतात. गणपती कधी आहेत / नवरात्री कधी आहेत / दिवाळी – दसरा, असे सगळे मोठे सण समजतात. चालू महिन्यात बँक हॉलिडेज कधी आहेत / सुट्या कधी आहेत / शनिवार – रविवार ला जोडून सुटी आहे का? अशा सगळ्या गोष्टी डोळ्यासमोरून घालता येतात आणि काही छोटे – मोठे प्लॅनिंग करता येते, आणि ते वेळेवर पूर्ण पण करता येते.

यांच्याशिवाय वर्षभरात अशी पण बरीचशी कामे असतात, कि, जी त्या-त्या महिन्यात किंवा त्या-त्या दिवशी किंवा त्याआधीच पूर्ण करावी लागतात. नाहीतर भुर्दंड बसू शकतो. आणि मनस्ताप पण होऊ शकतो.

माझा मित्र पुराणिक गेल्या वर्षी २० मे ला नोकरीमधून निवृत्त झाला. ऑफिस कडून छान सेंड ऑफ झाला, घरच्यांनीपण साठीचा मोठा कार्यक्रम केला आणि त्याचे रिटायर्ड लाईफ सुरु झाले. मध्यन्तरी एक दिवस हा बाईक वर चांदणी चौकातून चालला होता. इथल्या स्थानिक संस्कारांमुळे हेल्मेट नव्हतेच. पोलिसांनी हात करून गाडी थांबवली. आणि लायसेन्स मागितले. हा जरा रिलॅक्स झाला. म्हणजे हेल्मेट – नाही हे कारण नाही, लायसन्स चेक करणे सुरु असेल. यानी खिशामधून पाकीट काढलं आणि लायसन्स पोलिसाच्या हातात दिलं. म्हणजे आता लायसन्स परत घ्यायचं आणि सुटायचं.

पोलीस : साहेब, लायसन्स स्वतः बघा आणि मग दाखवा. गाडी साईड ला लावून या.

मित्र : लायसन्स माझंच आहे.

पोलीस : तुमचंच आहे साहेब, तारीख पण बघा 

मित्राची ट्यूब पेटली. रिटायर झालो त्याच दिवशी मुदत संपली आहे. आणि रिन्यू चे जाम विसरलो.

पुढे काय झाले असेल, ते सुज्ञास सांगणे न लगे.

माझी दिनदर्शिका जर असती, तर असे प्रसंग नक्कीच टळतात.

माझा मित्र गणेश पाच वर्षांपूर्वी निवृत्त झाला. कंपनीचे काही फंड आणि इतर पैसे त्याची कंपनी एलआयसी मध्ये जमा करते आणि आपल्याला ऍन्युइटी करून देते, जेणेकरून लाईफ लॉंग आपल्याला पेन्शन सारखे पैसे मिळत राहतात. काही प्रकारच्या ऍन्युइटी करता दर वर्षी विशिष्ठ तारखेच्या आत जिवंत असल्याचे प्रमाणपत्र एलआयसी कडे पाठवावे लागते. स्कीम व्यवस्थित सुरु झाली. सुरवातीला आपण दर महिन्याला पैसे जमा होत आहेत हे बघतो, नंतर दर महिन्याला बघणे होत नाही आणि तशी जरूर पण भासत नाही. गेल्या वर्षी त्याच्या लक्षात आलं, कि, ५ -६ महिने एलआयसी चे, पैसे जमा झालेलेच नाहीत. ऍन्युइटी मुंबईच्या ऑफिस ची होती. तिथे फोन लावला. आपल्याकडे आपल्या कामाकरता सरकारी कार्यालयात फोन लागणे हे एक दिव्यच असते. कायम एंगेज टोन येत राहतो. असंख्य वेळा ट्राय केल्यानंतर रिंग वाजते पण कुणी फोन उचलत नाही. मग असंख्य वेळा ट्राय केल्यानंतर केंव्हातरी तिथली रिसेप्शनिस्ट फोन घेते आणि तिथल्या कन्सर्न्ड माणसाला रिंग जाते, बराच वेळ पुढची रिंग वाजत असते आणि फोन कट होतो. या दिव्यामधून बाहेर पडल्यावर गणेशचा फोन लागला आणि समजलं, कि, जिवंत असल्याचा दाखला न पाठवल्यामुळे पेमेंट बंद झाले आहे. नंतर सगळे सुरळीत होण्याकरता किती फोनाफोनी / किती वेळ लागला असेल, ते – सुज्ञास सांगणे न लगे.

मोबाईल रिचार्ज करण्याची वेळ जवळ आली, कि, त्या कंपन्यांचे सारखे रिमायंडर यायला सुरुवात होते. काही वेळा तर रिचार्ज केल्यानंतर पण रिमायंडर येणे सुरु असते. असे रिमायंडर जिवंतपणाचा दाखला मागण्याकरता का येत नाहीत, असा विचार मनात येणे साहजिक आहे, पण अजून तरी येत नाहीत, हे सत्य आहे. परदेशात मात्र तशी सोय आहे. माझा एक मित्र स्वीडन मध्ये रहातो. याच विषयावर त्याच्याशी बोलतांना तो म्हणाला —

मित्र : तुमचे कुठलेही पेमेंट / डॉक्युमेंट ड्यू असेल तर तुम्हाला त्या ऑफिसकडून रिमायंडर हमखास येते. जिवंतपणाचा दाखल ड्यू असेल तर, त्या ऑफिस कडून मेसेज येतो – “सर / मॅडम, तुम्ही आहात ना? असाल तर कसे आहात? हसताय ना? वगैरे, वैगेरे. जर असाल, तर जिवंतपणाचा दाखला अमुक अमुक तारखेपर्यंत जरूर पाठवा. तुमच्या दीर्घायुष्याकरता आमच्या शुभेच्छा! दाखला आला नाही, तर काय ते आम्ही समजून घेऊ आणि योग्य ती प्रेयर पण तुमच्याकरता करू.

माझी दिनदर्शिका जर असती तर गणेश वर असा प्रसंग आला नसता, हे नक्की.

आवडो – न – आवडो, आपल्या सगळ्यांना इन्कम टॅक्स रिटर्न हे दर वर्षी भरावेच लागते. टॅक्स मध्ये जास्तीत जास्त वजावट मिळावी याकरता सगळेच प्रयत्नशील असतात. वजावट घेण्याचा एक महत्वाचा मार्ग म्हणजे ८० सी खाली वजावट मिळवणे. माझा एक मित्र आहे द्वारकादास, स्वतः सीए आहे आणि टॅक्सची प्रॅक्टिस करतो. त्यालाही रिटर्न भरावे लागते. गेल्या वर्षी रिटर्न भरतांना त्याच्या लक्षात आलं, कि यावर्षी पीपीएफ मध्ये पैसे भरायचे राहिले आहेत. गडबडीमुळे किंवा विसरल्यामुळे, लक्षात राहिले नाही आणि बाजूला ठेवलेले पैसे पीपीएफ मधे भरायचे राहिले, त्यामुळे दीड लाखावर मिळणारी वजावट त्याच्या स्वतःच्या अक्कलखाती पडली. माझी दिनदर्शिका जर असती तर असा प्रसंग नक्कीच आला नसता.

माझी एक मैत्रीण आहे मनवा. तिच्याकडे बऱ्याच वर्षांपूर्वी घेतलेली इंडिका होती. सहा वर्षांपूर्वी तिनी ऑटोमॅटिक गाडी घेतली आणि इंडिका सोसायटीच्या व्हिजिटर्स पार्किंग मधे सुस्तावली. गेल्या वर्षी सोसायटीनी वापरात नसलेल्या गाड्या हलवाव्या अशी नोटीस लावून सगळ्यांना तशी विनंती केली. मनवाला कल्पना आवडली. इंडिका विकून टाकावी म्हणून तिनी एजंट ना गाठलं.

एजंट : तुम्ही गाडीचे कागद, इन्शुरन्स, पीयूसी सगळे ओरिजिनल घेऊन या.

मनवानी कागद शोधायला सुरुवात केली, तेव्हा लक्षात आलं, कि गाडीचे ओरिजिनल कागद कुठेतरी मिसप्लेस झाले आहेत, कुठे ठेवल्या गेले आहेत, हे इतक्या मोठ्या गॅप नंतर आठवणे मुश्किल होते. नशिबानी गाडीमध्ये झेरॉक्स होते. एजंट कडे गेल्यावर समजलं कि गाडीचं रजिस्ट्रेशन ३ वर्षांपूर्वीच संपले आहे.

एजंट : मॅडम, आधी ग्रीनटॅक्स, पेनल्टी, वगैरे भरावे लागेल, इन्शुरन्स काढावा लागेल. गाडी पासिंग करता आरटीओ मध्ये न्यावी लागेल. त्याकरता गाडी रिपेअर आणि चकाचक करून घ्या. ओरिजिनल कागद नसल्यामुळे तुम्हाला सही करायला स्वतः आरटीओ मध्ये एक दिवस यावे लागेल. साधारण पंधरा हजार खर्च येईल. हे सगळे झाले, कि मग गाडी विकण्याची कागद पत्र तयार करू.

यावरून मनवाला गाडी विकण्याकरता काय काय सोपस्कार करावे लागले असतील, हे सहज लक्षात येईल.

माझी दिनदर्शिका जर असती, तर असे प्रसंग खूपच सोपे नक्कीच होतात.

– क्रमशः भाग पहिला 

© श्री सुधीर करंदीकर

मो. 9225631100 – ईमेल – srkarandikar@gmail. com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मनामनातील वेताळ… लेख क्र. ४ ☆ श्री संदीप सुंकले (दास चैतन्य) ☆

श्री संदीप सुंकले (दास चैतन्य) 

? मनमंजुषेतून ?

☆ मनामनातील वेताळ… लेख क्र. ४ ☆ श्री संदीप सुंकले (दास चैतन्य) 

” चार लोक काय म्हणतील…? “

थ्री इडियट हा सिनेमा जवळजवळ सर्वांनी पाहिला असेल…! त्यात एक विदारक सत्य मांडण्याचा प्रयत्न केला गेला आहे. अभियंत्याचा मुलगा अभियंता, डॉक्टरचा मुलगा डॉक्टर आणि तत्सम बरेच काही दाखवले आहे…

आपली सध्याची शिक्षण व्यवस्था उपजत अंगी असलेल्या गुणांना उपयोग करून स्वतःची प्रतिभा वापरून प्रगती साधण्यास वाव देण्याऐवजी उपलब्ध असलेल्या शैक्षणिक पर्यायांमध्ये आपापल्या गुणांचा उपयोग करून प्रगती करण्याची संधी देते असे म्हणावे लागेल आणि तेही एका अमर्यादित स्वरूपात… ,. असे खेदाने नमूद करावेसे वाटते…

– – त्यामुळे आपल्याकडील विद्यार्थी प्रचंड दबावात शिक्षण घेत आहेत असे आपल्या लक्षात येईल…! शिक्षण आनंददायी असावे असे आपण सर्वजण म्हणतो, पण ते खरेच आनंददायी होते का, हे पाहणं मात्र पालकांकडून होताना दिसत नाही…!!

सध्या सर्वसाधारण विद्यार्थी विद्यार्थीनी क्लास, शाळा, संध्याकाळी परत क्लास (अन्य छंदाचा), सर्व क्लासेस् चा गृहपाठ, पालकांच्या अपेक्षा, सामाजिक माध्यमांची चमकधमक, नैसर्गिक रित्या शरीरात होणारे हार्मोन्स मधील बदल, बदलत्या सामाजिक वातावरणाचा मुलांवर होणाऱ्या परिणाम, एक मूल असलेले, कुटुंब, मैदानी खेळांचा अभाव, मनातील भावनिक आणि शारीरिक घुसमट बाहेर पडण्यासाठी उपलब्ध असलेले मर्यादित पर्याय, यांनी गांजून गेली आहे…! हे सर्व वेताळ आहेत आणि यातले अर्धे अधिक पालकांच्या मनात आणि बाकीचे विद्यार्थ्यांच्या मनात आहेत… यातूनच आत्महत्या आणि अनेक दुष्कृत्य करण्यास विद्यार्थी धजावत आहेत… आणि यावर वेळीच उपाययोजना करण्याची गरज आहे… पटतंय ना?

बरेच वेळा सामान्य मनुष्य द्विधा मनस्थितीत असतो…! अहो, ते कशाला, महाभारतात अर्जुनसारख्या महान भक्ताला साक्षात परमात्मा सोबतीला असताना विषाद वाटला… युद्ध करावे की न करावे असा संभ्रम झाला तिथे आपल्या सारख्या सामान्य मनुष्याची काय कथा?

… सांगायचा मुद्दा इतकाच की सामान्य मनुष्याचा गोंधळ होणे, संभ्रम होणे अगदी स्वाभाविक आहे…!

सध्याच्या काळात कोणतीही गोष्ट करताना मनुष्याला आणिक एक प्रश्न भेडसावतो…!

… जगातील आज जे पर्यंत न सुटलेले प्रश्न आहेत, त्यामधील हा प्रश्न प्रमुख म्हणता येईल… सूज्ञ वाचकांच्या हा प्रश्न लक्षात आलाच असेल… आता मी आपली उत्सुकता फार ताणत नाही…

– – ” चार लोकं काय म्हणतील…?  “

अहो, जसे आपल्याला प्रश्न आहेत, तसे जगातील प्रत्येक माणसाला विविध प्रकारचे आणि विविध कंगोरे असलेले प्रश्न असतात, आहेत आणि हे पुढेही चालू राहील…! समर्थ रामदास स्वामी म्हणतात, *”त्याप्रमाणे जगी सर्व सुखी असा कोण आहे…? “* तर या प्रश्नाचे उत्तर कोणीही सुखी नाही असेच आहे.

… यामुळे ही जी चार लोकं आहेत, त्यांनाही आपल्यासारखे किंबहुना आपल्यापेक्षा जास्त गहन प्रश्न असतील… , ते त्यांचे प्रश्न सोडविण्यात इतके मग्न आहेत की त्यांना आपले प्रश्न पाहण्यात काडीचाही रस नसेल..

…. म्हणूनच तिकडे लक्ष न देता मनुष्याने आपल्याकडे उपलब्ध साधनांचा उपयोग करून, नीती धर्मांचे आचरण करून आपला सोडविण्याचा प्रयत्न करावा, त्यासाठी भगवंताकडे मदत मागावी. हा उपाय सर्वमान्य आणि उचित ठरू शकेल…!!

– – त्या चार लोकांचा विचार त्यांचा त्यांनाच करू दे, आपण आपला *”स्वार्थ”* पाहू…!

पहा, पटतंय का?

क्रमशः भाग चौथा 

© श्री संदीप सुंकले (दासचैतन्य)

मो. 8380019676

 ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी जडणघडण… भाग – ७३ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ माझी जडणघडण… – भाग – ७३  ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(सौजन्य : न्यूज स्टोरी टुडे, संपर्क : ९८६९४८४८००)

माणूस

एक गोष्ट निश्चित, हे मी माझ्या स्वतःच्या अनुभवावरून सांगते की प्रपंचात रमणारी माझ्यासारखी आणि माझ्यासारखीच अनेक, कितीही म्हणोत की, ” आयुष्यात जे जे करायचं ते ते सर्व अत्यंत जबाबदारीने आणि कर्तव्य बुद्धीने पार पाडलंय. आता निवांत निवृत्ती अनुभवावी. ”पण खरंच असं होतं का?

दोन्ही मुलींचे विवाह पार पाडल्यानंतर काहीसे असेच आम्हालाही वाटले होतेच पण थोड्याच दिवसांनी हेही लक्षात आले की तसे नसते. फक्त वाट बदलते, वळण बदलते. पुढच्या बदललेल्या वळणावरही निरनिराळ्या प्रकारची जीवनातली गुंतवणूक ही नाही सुटत पण तरीही “आता आपापले छंद, आवडीनिवडी जोपासायच्या, जमेल तितका प्रवास करायचा, देश विदेशातल्या आयकॉन ठिकाणांना भेटी द्यायच्या” हे मात्र आम्ही ठरवले.

आम्हाला दोघांनाही तशी प्रवासाची खूप आवड पण आयुष्याचा एक मोठा काळ मुलांचे संगोपन, शिक्षण, आर्थिक सुबत्तेसाठीची धावपळ, नातीगोती, रीती परंपरा, घरातल्या वृद्धांची काळजी यात अडकून पडलेला असतो. तरीही दरवर्षी आम्ही चौघं कधी मित्र-मैत्रिणींबरोबर कधी बहिणींच्या परिवाराबरोबर छोट्या-मोठ्या सहली, प्रवास करतच होतो आणि प्रत्येक वेळी प्रवासात आलेल्या अनुभवांच्या आठवणींनी नकळत समृद्ध होत असू. त्याचत्याच चक्रातून बाहेर पडून काही दिवसांसाठी तरी जगलेलं वेगळं जीवन मनाला दर वेळेस एक वेगळे चैतन्य, उभारी देते हे नक्कीच.

“केल्याने देशाटन मनुजा येई शहाणपण”

अशा घोकून पाठ केलेल्या सुभाषितांच्या पलीकडे जाऊन मी म्हणेन की रिक्रीएशन किंवा बदल नेहमीच मनाला ताजेतवाने करतात म्हणून जशी जमेल तशी यथाशक्ती भ्रमंती प्रत्येकाने जरूर करावी.

खरं म्हणजे प्रवास ही एक संस्कृती आहे. लहानपणी जर आम्हाला कोणी या वाटेवर चालायला शिकवलं असेल ते वडिलांनी आणि आजोबांनी. जवळजवळ प्रत्येक सुट्टीत आजोबा आम्हाला आणि माझ्या मावशीच्या परिवाराला घेऊन दूरच्या प्रवासाचे बेत आखत आणि अत्यंत उत्तमरीत्या ते पारही पडत. जवळजवळ काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंतचा प्रवास आमचा आजोबांमुळे घडला आणि त्या अनुषंगाने पर्यटनाची आवड आणि गरजही आयुष्यात निर्माण झाली. नकळतच या बालपणी केलेल्या प्रवासाने वेगळेच भौगोलिक, सामाजिक सांस्कृतिक, धार्मिक संस्कार आमच्या बालमनावर झाले. काही काही प्रसंग अजूनही स्मरणातून गेलेले नाहीत. एक छोटासा पण तरीही माणूसपणाचं दर्शन घडवणारा एक प्रसंग सांगते.

आम्ही गोव्याहून परतत होतो. त्यावेळी आंबोलीच्या घाटात आमची बस नादुरुस्त झाली. (त्यावेळी आता सारखे वेगवेगळे महामार्ग, दुपदरी चौपदरी रस्ते नव्हते) किर्र काळोख, गर्द झाडी, भयाण सामसूम, एकाकी रस्ता! मुख्य म्हणजे सहलीतील सगळ्यांना प्रचंड भुका लागल्या होत्या. जवळ खायलाही काहीच उरले नव्हते. पुढच्या टप्प्यावर एका ठिकाणी रात्रीचे जेवण घेण्याचा बेत ठरलेला होता पण तोही बस फेल झाल्यामुळे लांबला होता. आम्ही सारे हताशपणे, भुकेले बसच्या बाहेर येऊन त्या जंगलाने वेढलेल्या रस्त्यावर उभे होतो. तेवढ्यात कुठूनतरी दोन माणसं आमच्याजवळ आली. त्यांच्या हातात काठ्या आणि अंगावर फक्त देह झाकण्यापुरतीच वस्त्रं होती. गरीब, आदिवासी, जंगलात राहणारी ही लोकं आम्हाला म्हणाली, ” इथं जवळच आमची वस्ती हाय. चला तुमी पावनं. तुमच्या खाण्यापिण्याची बेस सोय करतालो. ”

ते भराभरर चालत गेले त्यांच्यापाठी काट्याकुट्यातून आम्हीही. त्यांनी घरात आवरावर करून निवांत बसलेल्या त्यांच्या बायकांना आमच्यासाठी जेवण बनवण्यास सांगितले आणि काय आश्चर्य त्या बायकांनी बघता बघता आम्हा पंधरा-सोळा जणांसाठी इतकं आनंदाने रांधलं आणि वाढलं! “हुलग्याची आमटी आणि तांदळाची भाकरी. ” आमटी चांगलीच झणझणीत होती. खाताना सारेच घामाघूम झाले होते. पांढऱ्या शुभ्र मऊसूत भाकऱ्यांची चवही खरपूस न्यारीच होती. आजही त्या जेवणाची चव माझ्या जिभेवर आहे आणि त्याहीपेक्षा त्यांचा प्रेमळ पाहूणचार आणि आदरातिथ्य पाहून आम्ही भारावून गेलो. यांना का गरीब म्हणायचं?  हाच प्रश्न त्यावेळी माझ्या मनात उमटला होता. ना नात्याचे ना गोत्याचे. पोटातल्या भुकेने जोडले गेलो होतो इतकेच. आम्ही देऊ केलेले पैसे त्यांनी घेतले की नाही ते मला आठवत नाही पण खरं म्हणजे आम्हीच कर्म दरिद्री म्हणून त्यांच्या अर्जवीपणाचा, प्रेमाचा आणि कष्टाचा हिशोब मात्र मांडला. असो!

प्रवास बालपणीचे, लग्नाआधी मित्र मैत्रिणींबरोबरचे, शाळा कॉलेजातल्या सहली आणि नंतरच्या आयुष्यात नवरा, मुलींबरोबर आणि आम्ही दोघांनीच नामांकित ट्रॅव्हल कंपनीं बरोबर केलेले अनेक प्रवास म्हणजे अनुभवांची, आनंदाची मनोरंजक भलीमोठी शिदोरीच म्हणावी लागेल.

अजंठा वेरूळच्या लेणी आणि तिथल्या पेंटिंग पासून ते पॅरिसच्या लुओरे (louvre)म्युझियम मधल्या कलाकृती पर्यंतचे सर्वच प्रवास अनोखे आणि आनंददायी होतेच पण तुमच्या कानात हळूच एक सांगते, ” प्रचंड तंगडतोड करत पॅरिसच्या जगद्विख्यात म्युझियम मधले जगभरात गाजलेले, खूप बंदोबस्तात ठेवलेले “मोनालिसाचे” पेंटिंग आम्ही पाहिले आणि मला अजंठाच्या दगडात कोरलेल्या पद्मपाणीच्या अलौकिक सुंदर लयबद्ध, भावपूर्ण आणि चिंतनयुक्त पेंटिंगची आठवण झाली आणि मी खरोखरच सहजपणे उद्गारले “कुठे ते आणि कुठे हे? ”

“मोनालीसा” पेंटिंग वरचे अनेक कलाकारांचे. ” ते का आणि कसे छान आहे” हे सांगणारे अनेक लेख मी वाचले आहेत त्यांचा सन्मान ठेवून मी माझे हे मत व्यक्त केले. बाकी म्युझियम मधल्या अनेक इतर कलाकृती बघतानाना मात्र खरोखरच आमच्या डोळ्याचे पारणे फिटले.

अशाच प्रकारचे आणखीही अनेक अनुभव मला माझ्या परदेश सफारीत आले. अमेरिकेत कुठेही कॅस्केड (छोटा धबधबा) पाह्यला आलेले अनेक टुरिस्ट्स मी अशा पर्यटन स्थळी पाहिलेत. आम्हीही त्यात असायचो. भव्य, सुंदर, आखीव रेखीव आणि अत्यंत स्वच्छ, देखणा पर्यटकांसाठी सर्व सुविधा असलेला परिसर. खूप पायपीट करून कॅस्केड पर्यंत पोहोचल्यानंतर कुठल्यातरी डोंगरातून एखादी बारीकशी पाण्याची धार वाहत असताना पाहिली की मनात “फूस्स” व्हायचं. वाटायचं त्यापेक्षा पावसाळ्यात आमच्या लोणावळा खंडाळ्याला सह्याद्रीतून वाहणारे झरे-धबधबे पाहायला या की! पण परदेशात फिरताना सतत जाणवतं ते पर्यटनाचे राष्ट्रीय महत्त्व आणि त्यासाठी प्रवाशांसाठी असलेल्या सुविधा (यात प्रामुख्याने स्वच्छतागृहे)आणि शिस्तबद्ध प्रवासीही. एकेका स्थळाचं जपलेलं सौंदर्य आणि महत्त्व मग तो *नायगारा* असो किंवा असाच एखादा छोटासा झरा- कॅसकेड! नैसर्गिक सौंदर्याची अपार जपणूक हा गुण तिथे विशेषत्त्वाने जाणवतो. आपल्याकडे स्थळांपेक्षा भेळपुरीचे कागद, खाल्लेले बुट्टे, रिकाम्या बाटल्या, असंख्य कागदांचा देखावा सभोवताली माजलेला पाहायला मिळतो. असो!

असाच आणखी एक मनाला छेदून जाणारा प्रसंग.

मध्य प्रदेशातील खजुराहो मंदिरातली ती सुरेख कोरीव कामशिल्पं पाहताना आम्ही सारेच अंतर्मुख झालो होतो. शिवपार्वतीच्या अनेक नृत्यांतून, पदन्यासातून, स्थिती आणि लयबद्ध आसनांतून साकार झालेली ती शृंगारिक लेणी आणि त्यातून झिरपणारं पावित्र्य, मांगल्याचं कामसूत्र न्याहाळताना मन अगदी हरखून गेलं होतं. डोळ्यात मावत नव्हतं असं ते सौंदर्य आणि ती कला किमया तृप्त मनाने नजरेत साठवून आम्ही पचमढीला जाण्यासाठी इटारसी स्टेशनवर आलो. गाडी यायला थोडा अवकाश होता. खजुराहो मंदिराला भेट दिल्यानंतर आता अनुभवत असलेला हा स्टेशनवरचा परिसर अत्यंत बकाल आणि दरिद्री होता आणि त्यातच कुठून तरी अचानक एक वेडगळ! बडबड करणारी, मातकट, केस पिंजरलेली पण संपूर्ण नग्न स्त्री भीक मागत स्टेशनवरच्या त्या गर्दीत केविलवाणी पण तरीही काहीशी बेफिकीर आणि बेशरमपणे फिरताना आम्ही पाहिली आणि मन इतकं कळवळलं! खरं म्हणजे एकच नग्नता! दगडात कोरलेली ती सुंदर, पवित्र भासणारी निर्जीव नग्नता आणि ही साक्षात समोर येऊन ठाकलेली बकाल, ओंगळ पण सजीव करूण, हतबल नग्नता. नाही विसरू शकत भ्रमंतीतले हे दृष्य कधीही.

आमची पहिली परदेश सफर म्हणजे १९९६ सालची लंडनची टूर. त्यावेळी ज्योतिका लंडनला होती. एमबीटी कंपनीतर्फे तिची तिथे नेमणूक झाली होती आणि तिथे ती शेअरिंग मध्ये एका सुंदर बंगल्यात राहत होती. मी विलास आणि मयुरा आम्ही ज्योतिकाला भेटण्याच्या निमित्ताने लंडनला गेलो होतो. दीड दोन महिने आम्ही लंडनला राहिलो आणि अर्थातच त्या संपूर्ण वास्तव्यात आम्ही लंडन ब्रिज फॉलींग, पासून ते आपल्या कोहिनूर हिऱ्यापर्यंत, तिथले हिरवेगार पार्क्स, तलावात पोहणारी मुक्त बदकं, तिथले कॅसल्स, मादाम तुसाड(जिथे अनेक जगप्रसिद्ध लोकांचे मेणाचे पुतळेआहेत) तिथल्या बिन गर्दीच्या आरामशीर लोकल ट्रेन्स, गुलाबी थंडी, भुरभुरणारा पाऊस, धुकं आणि मुख्य म्हणजे शिस्त आणि स्वच्छता अगदी भरपूर अनुभवली. अगदी भारावून जाऊन अनुभवली पण याही सहलीतला एक क्षण मात्र माझ्या मनात अजूनही ताजा आहे. वेगळ्या कारणाकरिता.

लंडनच्या हिथ्रो विमानतळावर पाऊल ठेवलं आणि मनात आलं आज आपण राणीच्या देशात आलोय. ज्या ब्रिटिशांनी आपल्या देशावर दीडशे वर्ष राज्य केलं आणि ज्यांच्याकडून स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी प्राणांची आहुती दिली त्या ब्रिटिशांच्या भूमीत आज आपण आहोत. अतिशय विलक्षण क्षण होता तो! संमिश्र भावनांचा. आम्ही आमचं इमिग्रेशन चेक वगैरे झाल्यावर बॅगेजसह बाहेर आलो आणि ज्योतिकाने दूरूनच धावत येऊन विमानतळावर आम्हाला इतकी घट्ट मिठी मारली की आम्हा सर्वांचे डोळे त्यावेळी ‘वियोगानंतरची भेट” म्हणून पाणावलेले पाहून एक ब्रिटिश सहप्रवासी आमच्या शेजारीच हातातल्या बॅगा खाली ठेवून क्षणभर स्तब्ध उभा राहिला. त्याच्याही डोळ्यात पाणी आले आणि तो उत्स्फूर्तपणे म्हणाला “व्हॉट अ ब्यूटीफुल फॅमिली यु आर! ”

सर्वसाधारणपणे ही ब्रिटिश माणसं खूप शिष्ट असतात. उगीच कुणाशी बोलतही नाहीत या पार्श्वभूमीवर मात्र जाणवलं की, “जगात तुम्ही कुठेही जा माणूस हा मूलभूत कुटुंबवत्सल असतो” आणि हे मी माझ्या अनेक देश विदेशी केलेल्या सफरीत नेहमीच अनुभवत आले आहे.

मी किती फिरले, किती देश पाहिले आणि त्या त्या ठिकाणच्या सुंदर पर्यटन स्थळांबद्दलची वर्णने येथे करत बसण्यात मला अजिबात रस नाही(आजकाल विविध टूर कंपन्यांमुळे अथवा इतर कारणांमुळे बहुसंख्य लोक प्रवास करत असतात) पण विविध देश, विविध ठिकाणं पाहताना तिथली सांस्कृतिक, सामाजिक, भौगोलिक, वैचारिक, कला गुणसंपन्न जीवनपद्धती अनुभवताना मला अगदी सातत्याने एकच जाणवत राहतं की विविध पेहरावांच्या, विविध चेहऱ्यांच्या आतला माणूस मात्र अगदी एकच आहे. काळ्या गोऱ्या मागे अदृश्यपणे वाहत असलेल्या भावनिक झऱ्यांमध्ये मात्र कमालीचे साम्य आहे, एकच ”ग्लोबल सेन्सिटीव्हीटी” जागतिक संवेदनशीलता.

म्हणूनच आपल्या बहिणाबाईने माणसाला मारलेली ती आर्त हाक पृथ्वीच्या कणाकणात सामावलेली आहे असेच वाटते.

– क्रमशः भाग ७३.

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ती कराचीची ट्रंक!!! ☆ डॉ. माधुरी जोशी ☆

डॉ. माधुरी जोशी

? मनमंजुषेतून ?

☆ ती कराचीची ट्रंक!!! डॉ. माधुरी जोशी 

पेपरमधे रावळपिंडीला आपलं घर पहायला जाणाऱ्या आजींची बातमी वाचली. १५ वर्षाच्या असतांना फाळणीत त्या भारतात आल्या. आता ७५ वर्षं झाली…. नव्वदीच्या झाल्या त्या…. पण ते जुनं घर, मित्रमैत्रिणी, गल्ल्या, रस्ते, घरं, कॉलेज सगळं पहावसं वाटलं परत….. आणि परवानगी घेऊन त्या गेल्या गतकाळातल्या स्म्रुती जागवायला……

.. क्षणात मला ४७ च्या फाळणीत नेसत्या वस्त्रानिशी, जीव मुठीत धरून, कसेबसे हिंदुस्थानात पोहोचलेले माझे सासूसासरे आठवले. तेंव्हा त्यांच्या डोळ्यापुढे सगळा अंधार…. कुठे जायचं? कुठे रहायचं? हातात कामंच नसेल तर कसं जगायचं? खरंच… केवढी भयाण पोकळी ही…. अनपेक्षित…. भयप्रद… जरी नातेवाईक असले तरी काही काळासाठी… कायम कसं चालेल भार टाकून!! आणि हिंदुस्थानात पण ऑलवेल नव्हतंच ना.. सगळं अस्वस्थ, कासावीस, अस्थिर, उधळलेलं….. स्थिरं व्हायला काळ लागणारंच होता.

एकीकडे बोटीनं काही सामान आलं. होतं. ज्यात काही भांडीकुंडी, एक लोखंडी ट्रंक असं काहीबाही होतं. एक सुखवस्तू जीवन, शिक्षकी पेशाच्या उत्तम नोकऱ्या, रहायला बऱ्यापैकी घर, घरात सोयीचं सारं सामान, आसपास ओळखीची घरं….. अशा सगळ्या कराचीतल्या सम्रुद्ध वातावरणातून आता जिवंत तरी पोहोचू की नाही आणि पोहोचलो तरी जगायचं कसं असे भयाण प्रश्न अचानक आ वासून उभे राहिले. जरी नातेवाईक असले तरी किती काळ? आपलं आपण उभं रहायलाच हवं…. पण कसं? कधी? कुठे??? सारी प्रश्नचिन्हंच प्रश्नचिन्हं….

सासुबाई मूळच्या धारवाडच्या. त्या काळातल्या ग्रँज्युएट.. संस्क्रुत वर प्रभुत्व असणाऱ्या…. ते घरंच सुशिक्षितांचं…. घरात वकील, डॉक्टर्स असे वडीलधारे… स्वतःचं मोठसं घर…. घरात राहणारी चुलत, मामे, मावस, आते भावंडं….. घराघरात अशी प्रथाच होती एकत्र जगण्याची…. एक सुशिक्षित, सुखरूप, सुखवस्तू, सम्रुद्ध जगणं होतं त्यांचं….

धारवाड फुलांचं, रसरशीत मातीचं, सुंदर हवामानाचं शांत गाव असं म्हणत त्या….. घरापासून कॉलेजपर्यंत जातांना येणारा मोगरीचा गंध, तिची टपोऱ्या मोत्यांसारखी फुलं, अबोलीनं बहरलेली सदैव टवटवीत शेंदरट अबोली घोसांची अगणित झुडपं, लाल पाठीच्या कुंदाच्या चांदण वेली, शेवंतीवर डोलणारे गुच्छांचे ताटवे…. लाल मातीवर केशरी, पिवळी, पांढरी, पखरण आणि सुगंध पण जपणारी रंगपंचमी…. आणि शांत, चढ उताऱ्याच्या रस्त्यांवरून बहिणी, मैत्रिणींबरोबर रोजचं चालंत जाणंयेणं….. असं सुंदर धारवाड…. त्यांना पाकिस्तानात कराचीला शिक्षकाची नोकरी करणाऱ्या सासऱ्यांचं स्थळ आलं. ते गणिताचे स्कॉलर, विद्यार्थी प्रिय शिक्षक, दिसायला चांगले… नीटस… कसल्या जबाबदाऱ्या नसणारे… तरी पण घालमेल झालीच.. ।एकदम पाकिस्तान? काय करायचं? पण तो बंध नियतीनंच बांधलेला होता… लग्न झालं आणि त्या कराचीला म्हणजे चक्क फॉरेनलाच गेल्या की….. शिक्षणामुळे त्यांनाही नोकरी मिळाली आणि एक छान, सुखाचा, सुरक्षित संसार सुरू झाला.

कराची पण भावलं त्यांना. सम्रुद्ध, संपन्न कराची…. शांत, समजूतदार शहर…. त्या सांगत आपल्याकडे भाजीची गाडी येते तशी ड्रायफ्रूट येत ढिगानी विकायला…. शेंगदाण्यासारखे पिस्ते बदाम आक्रोड खायचो आम्ही…. सुंदर ताज्या भाज्या… रसरशीत सगळं….. माणसं जिवाला जीव देणारी…. शिक्षक म्हणून जरा जास्त मान…. संध्याकाळी शाळेतून आल्यावर जरा फेरफटका मारून यावं तर वाटेवर दमदमीत सुगंधाच्या जुई मोगरीच्या लदलेल्या गाड्या… साऱ्या गल्लीत दरवळ… ।….

असं छान चाललेलं असतांना अचानक वादळ उठलं सुसाट… भयाण विचारांचे वारे.. ।।आपण सुरक्षित नाही अशा चर्चा.. त्या भितीदायक भावनेन ंशाश्वतीच उरली नाही आनंदानं जगण्याची… ।नव्हे!! जगण्याचीच… मग घाबरलेले सगळे भारतीय एकत्र आले… लपूनछपून कुठे कुठे आश्रय घेतले आणि एक दिवस त्या ट्रेननी ना जाणो कोणकोण, कुठून, कसे, कुणाच्या मदतीनं हिंदुस्थानात परत  आले. इथलं जगणंही नव्या लढाईचं होतं. एक मात्र सबळ, भक्कम गोष्ट होती ती म्हणजे दोघांच्या हातातलं शिक्षण… शिक्षकी नोकरीचा अनुभव… कासव गतीनं का होईना हळुहळू गणितं सुटली आणि एका अपमानित, अस्थिर, भयाण वातावरणाला पूर्णविराम मिळाला.

पुण्यात सुरवातीला त्यांच्याकडे ती ट्रंक होती. त्यात त्या वाण्याकडून आणलेल्या सामानाच्या पुड्या ठेवत. तेच कपाट आणि तेवढीच ग्रोसरी…. लागेल तेवढीच आणायची… जपून, पुरवून वापरायची…. ती ट्रंक नव्या संसाराच्या सुरवातीचा आधार… हळुहळूहळू स्थिरावत गेलं. सरकारी नोकऱ्या मिळाल्या. कधी एकत्र कधी वेगळ्या बदल्या झाल्या. महाराष्ट्रभर…. पण आता लढाई जरा वेगळ्या अर्थी सोपी होती…. जगणं आर्थिक, मानसिक सुरक्षित झालं. अक्षरशः शून्यातून त्यांनी पुन्हा संसार उभा केला.

या सगळ्या प्रवासात ही ती ट्रंक, जी सोबत होती. साक्षीदार होती. साधारण सव्वा फूट उंची, रुंदी, खोलीची चौकोनी, लोखंडी, काळी, भक्कम कडीकोयंड्याची… दोन्हीकडे धरायला कड्या आणि चांगलं दीड दोन इंचाचं उंच झाकण असलेली ती ट्रंक मग माझ्या घरात आली. त्यावर ऑईलपेंटनं नाव लिहीलं होतं S. M. Joshi Karachi असं….. मग आमच्या घरातले हातोडी, पाने, स्क्रू ड्रायव्हर, पकड, वायर्स, पिना असं नेहमी न लागणारं पण कामाचं सामान त्यात राहिलं. मग नको असलेली वाट्या भांडी किसणी स्टीलची गाळणी…. मग असंच काहीबाही…. शेवटी काही न ठेवता ट्रंक अडगळीत माळ्यावर गेली. जणू विस्मरणात गेली. जुनी झाली, , गंजली…

अलीकडे रंगकाम आवश्यक झालं माळ्याला ओल आल्यानं… सगळ्या सामानाबरोबर ट्रंक खाली आली. एकदम वाटलं काय करावं हिचं!! १९४७ ते २०२२!! बापरे!! अम्रुत महोत्सव की हिचा. ७५ वर्षांची झाली ही… जरा जास्त गंज धरला होता… झाकण जरा वाकडं झालं होतं… पण बरीचशी होती तशीच होती. भंगारात देण्याचा प्रश्नंच नव्हता. कराचीपासून या क्षणापर्यंत तिनं सोबत केली. केवढा काळ, केवढी स्थि्त्यंतरं, सभोवती कायकाय बदलतांना पाहिलं हिनं…. त्या ट्रेन प्रवासात ती पण भेदरली असेल मालकासारखी? पण तिनं साथ सोडली नाही हे मात्र नक्कीच…..

एकदम मनात आलं हिला चांगली घासूनपुसून लख्खं करावी. सुंदरसा मेटल स्प्रे कलर करावा आणि नव्या रुपात, ऐटीत, समाधानानं, क्रुतज्ञतेनं माळ्यावर नाही तर अगदी बैठकीत सन्मानानं ठेवावं हिला. तिचा गौरव करावा. मग शोध घेतला. पर्याय सापडला आणि ती गंजलेली, S. M. Joshi Karachi नावाची पेटी गेली पुढच्या रुपांतराला…. १०/१२ दिवस झाले. आणि नीतळ, झुळझुळीत, सिल्व्हर कलरची ट्रंक घरी आली. मुलांना या उद्योगातलं काहीच माहिती नव्हतं… पण त्या काळ्या ट्रंकेचा हा सुखद कायापालट भावला सगळ्यांना…. त्यांच्या आजीआजोबांची ती आठवण अधिक सुंदर होऊन अगदी हॉलमधे विराजमान झाली आहे. जणू आम्ही तिचे ऋण मानले. ७५ वर्षांपूर्वी कराचीच्या तिच्या अस्तित्वानंतर आज तिला नवजीवन मिळालं.

आता माझ्या शोभेच्या नाजुक वस्तू, फुलांचे हार, तोरणं, नाजुक पणत्या, यांना छान जागा मिळाल्येय त्या ७५ वर्षांच्या बुजुर्ग ट्रंकेच्या कुशीत!!!

© डॉ.माधुरी जोशी

 ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ संबंध… ☆ सुश्री संध्या बेडेकर ☆

सुश्री संध्या बेडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ संबंध… ☆ सुश्री संध्या बेडेकर ☆

“Graceful, durable old furniture आणि New fashionable furniture ची सांगड घालून घर सजवू या. ” 

काल छायाचा फोन आला. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर मला तिने विचारले, “मागच्या वर्षी तुझ्या नेहाचे लग्न झाले ना. तुमच्या काय अपेक्षा होत्या ग?? नेहाच्या काय अटी होत्या?? “

मी म्हंटले, “काय ग?? काय झाले आज?? अचानक हा प्रश्न कुठुन डोक्यात आला?? असं का विचारते आहेस?? “

छाया म्हणाली, “अग!! यावर्षी अजयचे लग्न करायचा विचार आहे. एका विवाह संस्थेत‌ नाव नोंदवले होते. काही मुलींची नावे शॉर्टलिस्ट केली आहेत. मुलींकडच्यांचे फोन पण येत आहेतच. मला तर हे खूप कठीण काम वाटतंय ग. कसं करावं की मुलींची पण dignity राहिल, व सर्व दृष्टीने समाधान होईल. खूप जास्त मोठ्या अपेक्षा नाहीत आमच्या, आपल्या सारखीच असावी. एकदा वाटतं मुलीला आधी आम्ही बघून, मग अजयने बघावी का? एकदा वाटतं, आधी अजयनेच बघावी, तिच्याशी बोलावे, भेटावे व नंतर जर गोष्टी पूढे गेल्या तर मग पूढच्या गोष्टी कराव्यात. “

 छाया पुढे म्हणाली, “मला वाटलं तुझ्याशी थोडं बोलावं म्हणजे, माझे‌ विचार थोडे स्पष्ट होतील. तुला मुलीच्या आईचा अनुभव आहे ना. तेंव्हा मुलीकडे कसा आणि काय विचार करतात हे कळेल. खूप अपेक्षा असतात का ग?? आजकाल म्हणे मुली आधी मुलाचे पॅकेज किती?? व प्रोपर्टी किती आहे?? हेच बघतात. खरं आहे का?? “

मी म्हंटले, “खरं सांगू का?? अग! प्रत्त्येक घर वेगळं असतं. अग! आपली मुलगी आनंदी रहावी यापेक्षा दुसरे काय हवं असतं ग?? आम्ही नेहाला पहिल्या पासून हेच सांगत आलो, की लग्न झाल्यावर दोनाचे चार हात होतात. तेंव्हा दोघे मिळून खूप कमवू शकता. मुलगा चांगला पाहिजे व घरचे अन्य सदस्य पण महत्वाचे असतातच. पैशापेक्षा माणसं महत्वाची.

मला अस वाटते, आधी तुम्हीच बघा. घरदार बघून बरंच लक्षात येतं. चौकशी करा. एखादी चांगली फॅमिली, म्हणजे तुमचे, त्यांचे विचार जुळत असतील तर, दोन्ही कडील पूर्ण फॅमिलीने दोन तिनदा भेटण्यास काही हरकत नाही. गप्पांमध्ये बरेच कळते. तुमचे विचार, अपेक्षा, परिस्थिती, त्यांच्या घरचे सणवार लक्षात येतात.

आजकाल मुली शिकलेल्या असतात, त्यांना डायरेक्ट प्रश्न विचारणे बरोबर वाटत नाही. तेंव्हा अशा भेटीत सर्व प्रश्नांची उत्तरे सहज मिळतात. बोलताना त्यांचा विचारांचा कल कळतो. व्यक्तिमत्त्वाचा अंदाज येतो. जीवनाकडे बघायचा दृष्टिकोन कळतो. चांगले होमवर्क करून जा, म्हणजे बोलण्यात कोणते विषय काढायचे??? याची तयारी होईल.

सध्याची‌ परिस्थीती म्हणजे, समाजात सध्या चालू असलेली प्रथा बदलायला हवी आहे. मुलींचे विचारही सध्या वेगळ्या दिशेने जात आहेत. घरातील माणसांपेक्षा घरातील वस्तूं जास्त महत्त्वाच्या वाटतायेत.

आजकाल मुलांचे आई-वडीलही आधीच माघार घेतात. आधीच ठरवून मोकळे होतात. आधीच असे दाखवतात की लग्न झाल्यावर वेगळे राहणेच बरं राहील. व त्याअर्थाचे वक्तव्य देतात. तयारी करतात. हा शेवटचा option असावा. “

“मुलाला मुलगी पसंत पडली की, तिने अजयला नीट साथ द्यावी. बस, एवढीच अपेक्षा आहे आमची. बाकी आमची काही अपेक्षा नाही. आमचा भार आमच्या मुलावर नाही. ते वेगळे राहिले तरी चालेल, वगैरे वगैरे बोलून मोकळे होतात. आधी पासून असे सिग्नल आपल्या बोलण्यातून द्यायची काय गरज?? त्यापेक्षा आम्हाला सून मुलीच्या रुपात हवी आहे, घराला सांभाळणारी, आमच्यात मिळुन मिसळून राहणारी. तिच्या नोकरी करण्याला आमचे बंधन नसेल. दोघांना दोन्ही घरचा आधार असणारच आहे. दोन्ही घरी अडीअडचणी ला ही मुलं असतीलच.

लग्न म्हणजे दोन्ही घरचा नेहमीचा संबंध असायला हवा. दोन्ही घरच्या सुख दुःखात एकमेकांची साथ हवी.

अहो! एकाच घरच्या दोन भावांची घरे वेगळी असतात. कारण दोन्ही घरच्या बायका वेगवेगळ्या घरातुन येतात ना म्हणून. आपल्या बाबतीत तर आपण अगदी दोन वेगळ्या फॅमिलीज आहोत. तेंव्हा फरक असणारच आहे. तुमच्या आणि आमच्या काही चांगल्या पद्धती मिळुन‌ नवीन काही चांगल्या पध्दती दोन्ही घरात सुरू होतील. नक्कीच चांगले होईल. आणि घाई कशाचीच नाही. adjust व्हायला थोडा वेळ लागेल एवढंच. ‘ अशा अर्थाचे बोलणे जास्त चांगले व‌ positive वातावरण निर्माण करेल.

मुलगा लग्न झाल्यावर आपला रहात नाही असा विचारच करायचा नाही. मी छायाला म्हंटलं, “तू आपल्या सूनेबद्दल जे चित्र मनात रेखाटलं आहे ते तसंच व्हायला तुम्हाला प्रयत्न करावा लागेल. हे बघ आरामदायी म्हातारपण हवे असेल तर एकत्र राहणं तुमच्या करिता चांगलेच आहे व नोकरी करणाऱ्या सूनेकरिता पण ते सोईस्करच असणार आहे. दोन पीढी एकत्र रहायचे म्हणजे सोपं गणित नाही. तडजोड करावीच लागणार आहे. कारण जनरेशन गॅप एवढा मोठा आहे की सर्वांचे सर्वांना सर्व पटेल हे शक्यच नाही.

अग! पस्तीस वर्षे झाली आम्हा दोघांना बरोबर राहून. तरी प्रत्त्येक गोष्टी वर एकमत असतंच असं नाही. पण आपल्या माणसांसाठी तडजोड केली तर काय हरकत आहे?? नोकरी करणारी सून पाहिजे तर तडजोड जास्तच करावी लागेल. स्पष्ट व गोड बोलून सर्व सहज शक्य होऊ शकतं. मनातल्या मनात धूसफूस, भुणभुण करणे, बाहेरच्या लोकांना घरातील गोष्टी सांगण्यापेक्षा घरातील लोकांशी स्पष्ट बोलून मार्ग काढणे जास्त चांगले नाही का?? त्यामुळे कान भरणे हा प्रकार होणारच नाही.

सून म्हणजे, तुझ्या एवढाच तिचा पण मान‌ या घरात असायला हवा आहे. ती तुमची पूढची पीढी आहे. तुझ्या लाडक्याची अर्धांगिनी आहे. मुलगा तेवढा माझा, मग सून‌ तुझी नाही का?? हा दूजाभाव नको.

अजयला नुसता खोकला झाला तरी तू काळजी करते, तेवढेच प्रेम आपल्या सूनेवरही करायचे. आपण आपल्या कडून पूढाकार घ्यायचा. सूनेला आपलं मानणे व ते आपल्या कृतीतून दाखविणे ही या नात्याची सर्वात महत्त्वाची व आवश्यक पहिली पायरी आहे.

माझी आजी म्हणायची, मुलगा तर माझा आहेच. सूनेला आपलसं करण्यासाठी मी नेहमीच प्रयत्न करते. तिच्या घरच्यांचा मान ठेवते. शेतावरून आंबे आले, धान्य आले की आधी त्यातले थोडे तरी मी सूनेच्या माहेरी नक्की पाठवते. सूनेचा वाढदिवस मी आठवणीने साजरा करते. हे असे प्रसंग नातं घट्ट करतात.

माझा मुलगा आता फक्त माझा नाही त्याच्यावर माझ्या इतकाच हक्क असणारी त्यांची बायको ही आहे, हे सत्य पचले पाहिजे. आता सूनेचे माहेर ही माझ्या मुलाची extended फॅमिली असणार आहे. हे ही सत्य पचले पाहिजे.

मन मोठ्ठं व मोकळं ठेवावे लागेल. लहान सहान गोष्टींवर दुर्लक्ष करणे, प्रतिक्रिया न देणे, body language वर लक्ष देणे हे प्रयत्नपुर्वक शिकावे लागेल.

सूनेच्या नावाने बोंब मारणे, सर्वात सोप्पे काम आहे. पण त्यात आपण आपले कर्तव्य व्यवस्थित पार पाडण्यात कमी पडलो‌ का?? हाही अर्थ निघतोच. तेंव्हा home work खूप करायचे आहे.

Ego, पैसा, practical approach, प्रतिष्ठा, formal relations, चढाओढ, शोबाजी, property, माणसांपेक्षा पैसा जास्त महत्त्वाचा, ही समज या सध्याच्या परिस्थितीत हावी आहे. या पेक्षा प्रेम, संबंध, आत्मियता, एकमेकांची काळजी, आधार, समाधान या जास्त महत्वाच्या गोष्टी आहेत हे पुन्हा एकदा समाजात युवा मंडळीला समजावयाची गरज आहे. सुरवात करायला हवी आहे. वेळ लागेल, उशिरा का होईना पण परीणाम नक्की दिसतील.

पैसा व माणसं हे दोन्ही आयुष्यात महत्वाचे व आवश्यक आहेत पण त्याचा बॅलन्स सांभाळता आला पाहिजे.

कुठे थांबायचे??? हे प्रत्येकाला प्रत्त्येक क्षेत्रात नेहमी समजलंच पाहिजे. मग ते प्रकृतीवर अतिक्रमण असो किंवा पैशामागे धावणे असो. जूनी पीढी असो नाही तर नवीन पिढी असो.

आपली पीढी म्हणजे नवीन व‌ जून्या पद्धती रितीरिवाज, संस्कार यांना जोडणारा ब्रिज आहे व त्यामधून मार्ग काढायला आपण शिकलो आहोत. अनेक challenges बघीतले आहेत, झेलले आहेत, व यशस्वीपणे पार केले आहेत. आता हे challenge ही सफलतेने पार पाडू या. नवीन वाहणाऱ्या वाऱ्याची दिशा बदलायचा प्रयत्न करू या. विचारांचे नातं इतकं घट्ट करूया की मतभेद पण हसत हसत स्विकारायला शिकूया. Graceful, durable Old furniture व New fashionable furniture ची सांगड घालून पुन्हा एकदा घर सजवू या.

सामान्य जीवन जगणे हे खरंतर प्रत्येकाकरिता व त्याच्या कुटुंबीयांकरिता असामान्य व आनंददायी गोष्ट असते.

सूनेला पारखायचा नाही, समजायचा प्रयत्न करावा. म्हणतात ना, ‘रिश्ते बरकरार रखने के लिए एकही शर्त है, किसी की कमियां नहीं, अच्छाइयां देखें। ईश्वर तो सिर्फ मिलाने का काम करता हैं। संबंधों में नजदीकियां और दूरियां बढ़ाने का काम तो इन्सानही करता हैं।’

© सुश्री संध्या बेडेकर 

वारजे, पुणे. 

7507340231

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ अडखळलेली पावलं… ☆ श्री नितीन सुभाष चंदनशिवे ☆

श्री नितीन सुभाष चंदनशिवे

? मनमंजुषेतून ?

☆ अडखळलेली पावलं… ☆ श्री नितीन सुभाष चंदनशिवे 

रुसून माहेरी आलेल्या ताईला सांगत होती आजी असेच काही समजावून…

“पिठात पाणी घातल्याबिगर भाकरी थापता येत न्हाई पोरी,

जगाची रीतच अशी ही सासुरवास कुणाला चुकलाय का?

कसा संसार उभा जन्म केला आमचं आम्हाला ठावं. “

 

मग आठवलं मला बालपण,

ताईने अंगणात आखलेली ती रिंगणं…

दगडाची चीप रिंगणात टाकून लंगडी खेळत म्हणायची,

“माझ्या नादाला कुणी जर लागलं तर,

एका फटक्यात आडवी करीन… “

तेव्हा आई म्हणायची

” उद्या लगीन झाल्यावर कळल तुला.

सासू एका दणक्यात सरळ करील. “

 

नाक फुगवत ताई म्हणायची

“अगं सासू असू दे न्हायतर नवरा.

मी करीन त्याचा भवरा.. “

 

आम्ही सगळे खळखळून हसायचो…

आणि ताई वाघिणीसारखी चालत म्हणायची,

“नाद करायचा न्हाय माझा चल हो बाजूला. “

आणि राजकुमारी असल्यागत ऐटीत झोक्यावर जाऊन बसायची.

 

आत्ता हीच वाघीण शेळी होऊन बसली होती

आज्जी सांगत होती.. आणि ताई फक्त मान डोलवत होती.

व्यवस्थेच्या पिंजऱ्यात ठेवलेली कोंबडीच ना शेवटी ती…

फरक इतकाच… मरेपर्यंत धगीवर शिजत राहते बस इतकंच…

 

जरा काय झालं, कुणी काय बोललं की,

रुसून लगेच माहेराला यायची.

माहेरपण जगायची..

चार दिवसात राग संपायचा

कुणीतरी समजूत काढायचं.

मग अचानक भावजी यायचे

चिमणी पुन्हा हसायची.. सगळं विसरायची.

आणि परत तिच्या चिमण्यासोबत निघायची…

 

“सासरच्या घरी जाताना अर्धं पोतं ज्वारी,

थोडंसं गहू, जमलंच तर वायशी तांदूळ,

आणि बरणीभर लोणचं, थोडीशी चटणी… 

आणि तिच्या काळजाची वाटणी करून

तिची निरोपाची पावलं चालू लागायची

 

गाडी यायची.. गडबड व्हायची

सामान अगोदर आत.. नंतर आमची चिमणी.. मग भावजी आत

खिडकीतून हात हातात यायचा

तिचे पाणावलेले डोळे.. त्या हिरव्या बांगड्या..

आणि खिडकीच्या काचेतून बाहेर हसत असलेलं..

तिचं तिच्या जन्मासोबत आलेलं स्वातंत्र्य…

 

टांग… टांग… घंटा वाजायची

तिचं स्वातंत्र्य आकाशात भुर्रकन उडून जायचं…

कंडक्टर दार जोरात ओढून घ्यायचा.

गाडी पुढे जायची..

 

तेव्हा… मला दिसायचं

गाडीच्या पाठीमागे लिहिलेले वाक्य..

 

“मुलापेक्षा मुलगी बरी

प्रकाश देते दोन्ही घरी”

——

© श्री नितीन सुभाष चंदनशिवे (दंगलकार)

लेखक / कवी

संपर्क – मु. पोस्ट. कवठेमहांकाळ, जि. सांगली.

मो 7020909521

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ अंपायर्स कॉल… ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

श्री मकरंद पिंपुटकर

??

☆ अंपायर्स कॉल… ☆ श्री मकरंद पिंपुटकर 

विद्या वहिनी आणि माझा मामेभाऊ कौस्तुभ यांच्या मुलाचं तीन वर्षांपूर्वी लग्न झालं होतं, त्या लग्नाचा अल्बम बघत त्यांच्याशी निवांत गप्पा मारणं चाललं होतं. लग्न कसं जमलं, पत्रिका बघणं वगैरे विषय निघाले आणि मिश्किलपणे वहिनी म्हणाली, “लेकाच्या लग्नासाठी मुलींच्या पत्रिका येत होत्या, मग आम्ही आमच्या पुरोहितांकडून कामचलाऊरीत्या – प्राथमिक पत्रिका कशी बघायची, किती गुण जुळत आहेत ते कसं ठरवायचं हे सगळं शिकून घेतलं, आणि गंमत म्हणून आम्हा दोघांचे पत्रिकांनुसार किती गुण जुळतात ते पाहायचं ठरवलं. ”

— —

क्रिकेटमध्ये अंपायरने एखाद्या फलंदाजाला पायचीत (LBW) बाद ठरवलं, तर फलंदाजाला दाद (DRS) मागण्याचा हक्क असतो. जर अर्धवट चेंडूचाच यष्टीला (स्टंप) स्पर्श होत असेल, तर चेंडू यष्टीला नक्की लागत आहे का नाही, फलंदाज बाद आहे का नाही, हे अंपायरने दिलेल्या निर्णयानुसारच ठरते. जर अंपायरने फलंदाजाला बाद दिले असेल तर तोच निर्णय कायम ठेवला जातो, आणि जर नाबाद दिले असेल, तर तो निर्णय कायम ठेवला जातो.

– – – याला क्रिकेटच्या भाषेत “अंपायर्स कॉल” असं म्हणतात.

— —

“आमच्या लग्नापूर्वीची गोष्ट आहे ही. कौस्तुभची मोठी बहीण – किशोरी – ज्या कंपनीत नोकरीला होती, त्याच कंपनीत मी दोन – तीन महिन्यांपूर्वी कामाला लागले होते. नंतर ती आजारपणामुळे सलग काही दिवस कामाला आली नाही, म्हणून मी आणि मैत्रीण तिला घरी भेटायला गेलो होतो. आणि तेव्हा कौस्तुभची माझी पहिली भेट झाली होती.

योगायोगाने, एक महिन्याभरातच बाबांच्या एका मित्राने आम्हाला त्याचं स्थळ सुचवलं. त्यांनीच परस्पर माझी पत्रिकाही कौस्तुभच्या आई वडिलांना पाठवून दिली. त्यांच्याकडून पत्रिका जुळत असल्याचा निरोप आला, आणि मग प्रत्यक्ष त्यांच्याकडे भेटायला जाण्याबद्दल बाबांचे मित्र आणि बाबा बोलत होते.

चर्चेत ऐकू येणारे कौस्तुभचे आडनाव आणि पत्ता ऐकून मी म्हटलंही, “मी गेले आहे या घरी. याला बघितलंही आहे बहुतेक. ” त्यावर काकांनी मी कदाचित त्याच्या धाकट्या भावाला पाहिले असेल असं म्हटलं, आणि एकदा प्रत्यक्ष भेटावं असा आग्रह धरला.

सरतेशेवटी आम्ही त्यांच्या घरी गेलो, रीतसर मुलगा / मुलगी बघण्याचा कार्यक्रम झाला, पसंदापसंदी झाली, मी ‘ हो ‘ म्हटलं आणि चि. सौ. कां. विद्या परांजपे सौ. विद्या कौस्तुभ जोशी झाली.

घरी सासू, सासरे, धाकटा दीर सगळेच होते. नणंद किशोरी – तिचं आधीच लग्न झालं होतं. मी कौस्तुभला अगदी ‘अहो कौस्तुभ’सुद्धा म्हणायचे. आमचा काही प्रेमविवाह नव्हता, त्यामुळे रुसवेफुगवे, एकमेकांचे काही निर्णय न पटणे, वादावादी हे सगळं झालंसुद्धा.

माझ्या काही गोष्टी त्याला पटत नसायच्या, त्याच्या काही सवयींबद्दल मला आक्षेप होता. पण ही सगळी चहाच्या कपातली वादळं असायची, थोडी खळखळ व्हायची, पण नंतर शांतही व्हायची.

कौस्तुभची नोकरी, माझीही नोकरी, सासूबाईंचं अपघाती निधन, माझं बाळंतपण, नोकरीवर जाताना लेकाला माहेरी आईकडे सोडायचं – येताना त्याला परत घेऊन यायचं, कौस्तुभची वर्क्स मॅनेजरपदाची नोकरी, नंतर स्वतंत्र व्यवसाय – भरपूर धावपळ असायची.

पुढे धाकट्या दीराचंही लग्न झालं होतं, ते दोघं त्याच्या नोकरीमुळे वेगळ्या शहरात राहू लागले. नंतर वयोमानापरत्वे सासऱ्यांचेही निधन झाले. इकडे लेक शिकत होता, मोठा होत होता, इंजिनियर झाला, MBA केलं आणि बघता बघता त्याच्या लग्नाचे वारे वाहू लागले.

आणि तेव्हा आम्ही आमच्या पुरोहितांकडून कामचलाऊरीत्या पत्रिका कशा बघायच्या हे शिकून घेतलं. गंमत म्हणून आम्हा दोघांच्या पत्रिकांचे किती गुण जुळतात हे पाहिलं, तर ३६ पैकी आमचे फक्त १८. ५ गुण जुळत होते. कमीत कमी १८ गुण तरी जुळणं गरजेचं असतं, म्हणजे आम्ही दोघं अगदीच काठावर पास झालो होतो.

… कोणत्या गुरुजींनी आमच्या पत्रिका पाहून, फक्त १८. ५ गुण जुळत असूनही आमच्या लग्नावर शिक्कामोर्तब केलं होतं, कोण जाणे!

मला खरंतर आश्चर्य वाटलं, लग्न ठरवण्यासाठी ३६ पैकी कमीत कमी २४ तरी गुण जुळावेत अशी अपेक्षा धरली जाते, आणि इथे तर अगदीच कमी गुण जुळले असूनही आम्ही इतकी वर्षं गुण्यागोविंदाने संसार करत होतो.

कौस्तुभचे आजारपण, त्याची बायपास सर्जरी, त्याचा व्यवसाय सुरू असताना मी केलेल्या अनेक adjustments जशा माझ्या नजरेसमोरून सरकल्या, तसेच माझा accident, हाताचं fracture, मनगटाचं fracture या काळात आणि नंतर रोजच, भाजी निवडण्यापासून, चिरण्यापासून – स्वयंपाकघरातील आणि घरातील अनेक लहानमोठ्या गोष्टींत कौस्तुभचं माझा शब्दशः उजवा हात होणं – याही गोष्टी मला प्रकर्षानं जाणवल्या.

… ज्या कोण्या गुरुजींनी आमच्या पत्रिका बघितल्या होत्या, तो “अंपायर्स कॉल” आमच्या बाबतीत २००% खरा ठरला होता, हेच खरं.

वहिनी बोलायची थांबली. आता आणखी काही बोलायची गरजच नव्हती.

… शब्दावाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडले!

© श्री मकरंद पिंपुटकर

चिंचवड

मो ८६९८०५३२१५   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares