मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “हळदी कुंकू…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

??

☆ “हळदी कुंकू …” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

हळदी कुंकवाला घरी बोलावणे ही एक सुंदर प्रथा आपल्या धर्मात आहे. त्यानिमित्ताने आवर्जून एकमेकांच्या घरी जाणे होते. स्नेहबंध राहतो. नाती दृढ होतात.. टिकून राहतात. एकमेकांच्या घरी गेल्याने पुढच्या पिढीची ओळख.. जवळीक होते. ही नात्यांची साखळी पुढे पुढे जात राहते.

 

 माझ्या लहानपणी हळदीकुंकवाचे आमंत्रण देणे याची फार गंमत असायची. लांब राहणाऱ्या लोकांचे आमंत्रण वडील सायकलवरून जाऊन देत असत. भाऊ मोठा झाला की हे काम तो करायला लागला. जवळ राहणाऱ्या आईच्या आणि आमच्या मैत्रिणींकडे आमंत्रण आम्ही दोघी बहिणी करायला जात असू. त्याची आम्हाला फार मज्जा वाटायची. शाळेतून आलो की आम्ही निघत असू. त्यांचा क्रमही ठरलेला असायचा.

 

पहिलं घर होतं आईच्या मैत्रिणीचं भडभडे मावशीच… एकदा काय गंमत झाली…

मावशीकडे गेलो. ती बसा. म्हणाली तिने आम्हाला दोघींना खोबऱ्याच्या वड्या खायला दिल्या. आम्ही खात होतो. त्यांच्याकडे पाहुणे आलेले आजोबा समोर बसलेले होते. त्यांनी आमची नावं विचारली. मग म्हणाले,

” पाढे पाठ आहेत का ?ते पाठ करा हिशोब घालताना आयुष्यभर त्यांचा उपयोग होतो. “

” हो आम्ही पाढे पाठ केलेले आहेत ” बहीण म्हणाली.

” मग म्हण बघू एकोणतीसचा पाढा “.. आजोबा म्हणाले.

मावशी म्हणाली….

“अहो पोरींची परीक्षा कसली घेताय? “

 

पण बहिणीने सहजपणे एकोणतीसचा पाढा म्हणून दाखवला. आजोबा एकदम खुश झाले.

म्हणाले, ” पोरगी फार हुशार आहे धीटुकली आहे. त्यांना अजून एक एक वडी दे. “

 

आजोबांचं भविष्य खरं झालं. आक्का हुशारच होती. मोठी झाल्यावर तिने स्वतःचा क्लास काढला आणि हजारो मुलांना शहाणं केलं, शिकवलं.

 

आईच्या बागडे या मैत्रिणीकडे गेलो होतो. ती गप्पीष्ट होती. गंमत जंमत करायची. म्हणून ती आम्हाला फार आवडायची.

ती म्हणाली, ” तुम्हाला च ची भाषा येते का?”

“हो येते की. “.. तेव्हा ती सगळ्यांनाच यायची.

संदीप खरेनी त्या च च्या भाषेत ” चम्हाला तु चंगतो सा… “.. अगदी वेगळीच अशी कविता पण केली आहे.

 

 

मावशी म्हणाली, ” तुम्हाला अजून एक भाषा सांगते. मुंडा रूप्याची “

” मावशी ही कुठली भाषा “?

मग तिने आम्हाला नीट समजावून सांगितलं.

 

प्रथम व म्हणायचं मग त्या अक्षराचा पहिला शब्द सोडून बाकीचे पुढचे सगळे शब्द म्हणायचे नंतर मुंडा म्हणायच नंतर पहिला शब्द म्हणून रूप्या म्हणायचं.. तुला म्हणताना वला मुंडा तू रुप्या म्हणायचं.. काहीतरी म्हणताना वहीतरी मुंडा का रुप्या म्हणायचं… “

मावशीने हे निराळच शिकवलं.

त्याची फार गंमत वाटायला लागली. आम्ही ती भाषा लगेच शिकलो. माझ्या भावाला पण ती भाषा यायला लागली. पुढे आमचे आम्हाला काही प्रायव्हेट बोलायचं असलं की आम्ही त्या भाषेत बोलत असू. अजूनही आमची ती मजा चालू असते.

 

आम्ही दोघी बहिणी हातात हात घेऊन… गप्पा मारत जात असलेला तो रस्ता आठवणीने सुद्धा जीवाला सुखावतो…

आईच्या मैत्रिणी, वाड्यात राहणाऱ्या काकू, आसपास राहणारे, स्मरणात आहेत. आईच्या गुजराती, मारवाडी मैत्रिणी सुंदर साड्या दागिने घालून हळदी कुंकवाला यायच्या. कसेही करून वेळात वेळ काढून, ऊशीर झाला तरी बायका हळदी कुंकवाला यायच्याच…

अत्तरदाणी, गुलाबदाणी बाहेर काढायची. वडील त्यासाठी गुलाब पाण्याची बाटली आणून द्यायचे.

चैत्रगौरीला हातावर कैरीची डाळ दिली जायची. काही हुशार बायका डबा घेऊन यायच्या. मोठ्या पातेल्यात पन्हे करायचे. पाणी प्यायच्या भांड्यात ते द्यायचे. ओल्या हरभऱ्यानी ओटी भरली जायची. आम्हा मुलींना पण मूठ मूठ हरबरे दिले जायचे. त्याचे आम्हाला फार कौतुक वाटायचे. आई त्याचे चटपट चणे, मिक्स भाजी, उसळ असे पदार्थ करायची. हळदी कुंकवाच्या निमित्ताने त्या ऋतूला साजेसे आणि पोटाला योग्य असे हे पदार्थ केले जायचे आणि आरोग्य सांभाळले जायचे.

 

या हळदी कुंकवाच्या आमंत्रणाची जी. ए. कुलकर्णी यांची “चैत्र” ही नितांत सुंदर कथा आहे.

श्रावण शुक्रवारच हळदीकुंकू छोट्या प्रमाणात असायचं. वाड्यात आणि जवळ राहणाऱ्या बायका यायच्या.

गरम मसाला दूध आणि फुटाणे दिले जायचे. पावसाळ्यात फुटाणे खाल्ले की खोकला होत नाही अस आजी सांगायची.

“शुक्रवारचे फुटाणे “….

असं म्हणून ओरडत सकाळीच फुटाणेवाला यायचा. त्याची पण आज आठवण आली.

 

गणपती नंतर गौरी यायच्या. पण त्याचं आमंत्रण घरोघरी जाऊन द्यायचं नसायचं. जिला जसा वेळ होईल तसं ती येऊन जायची कारण त्यावेळेस प्रत्येकजण गडबडीत असायची. त्या हळदीकुंकवाला

“गौरीचे दर्शन ” महत्त्वाचे असायचे. प्रसाद म्हणून हातावर अगदी साखर खोबरे सुद्धा दिले जायचे.

 

संक्रांतीला तिळाची वडी, लाडू असायचा. आईच्या गुजराथी मैत्रिणीने तिला नुसत्या साखरेची कॅरमल सारखा पाक करून लाटून करायची वडी शिकवली होती. ती खुसखुशीत वडी सगळ्यांना आवडायची. आम्हाला मात्र कोणी काय लुटलं याचीच उत्सुकता असायची. प्लास्टिकचे डबे, छोट्या वाट्या, गाळणी, कुंकू, दोऱ्याचे रीळ, आरसे, रुमाल असं काही काही असायचं.

 

एकदा आईच्या मैत्रिणीनी.. अघोरकर मावशींनी सगळ्यांना शंभर पानी वही दिली होती. त्यावर रोज एका पानावर “श्रीराम जय राम जय जय राम” लिहायचं असं तिने सांगितलं होतं.

किती गोड कल्पना.. काही दिवस आपोआप नामस्मरण होत गेलं.

 

हळदीकुंकवाला बायका यायच्या. गप्पा व्हायच्या. नव्या नवरीला नाव घे म्हटलं की ती लाजत लाजत नाव घ्यायची….

त्या दिवशी घरी घूम चालायची…. वडील मित्राकडे जायचे किंवा नातेवाईकांकडे जायचे. चार पासून ते रात्री आठपर्यंत गडबड असायची. दिवसभर आई खुश असायची.

किती छान दिवस होते ते…. आताही आठवले तरी मन हरखून जाते.

आपली ही हिंदू संस्कृतीची परंपरा आपण अशीच चालू ठेऊ या…

संक्रांतीच्या हळदीकुंकवाची तुमची तयारी झाली का? यावर्षी काय लुटणार आहात?

बऱ्याच बऱ्याच गोष्टी आतापर्यंत लुटून झालेल्या आहेत. यावेळेस काहीतरी वेगळं लुटू या का? 

 

करा बरं विचार……

 तुम्हालाही काहीतरी नवीन सुचेल. जरा वेगळं असं काही मिळालं की मजा येईल…

माझ्या मनात एक विचार आला..

 

यावर्षी ” वेळ ” लुटायची कल्पना कशी वाटते तुम्हाला ?

कोणाला तरी तुमचा वेळ द्या. आनंदाने प्रेमाने त्याच्याशी बोला. प्रत्यक्ष भेटा… फोन करा…

” तिळगुळ घ्या गोड गोड बोला ” 

असं नुसतं म्हणण्यापेक्षा प्रत्यक्ष बोललात तर जास्ती आनंद होईल……

 यावर्षी असा आनंदच लुटला तर….

तुम्ही तुमच्या पद्धतीने कसाही साजरा करा. तुम्ही आणलेलं वाण सगळ्यांना जरूर द्या…

 

हा आनंद लुटायचा सण आहे.

कोणाचा आनंद कशात आहे हे तुम्हाला माहीत आहे…

तो मात्र त्याला जरूर द्या.

संक्रांतीच्या तुम्हाला सर्वांना मनापासून शुभेच्छा.

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

पुणे

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “गाणं आपलं आपल्यासाठी…” ☆ श्री आशिष मुळे ☆

श्री आशिष मुळे

??

☆ “गाणं आपलं आपल्यासाठी…” ☆ श्री आशिष मुळे ☆

(एक वेगळचं गाणं आणि त्यामागचा वेगळाच दृष्टीकोन अगदी त्याच्या पार्श्वभूमीसह, काही प्रतिमांसह…)

न मन बेहूदा गिरदे…

शब्द माणसाला बनवतात का माणूस शब्दांना बनवतो? या प्रश्नाचे ठाम उत्तर मी तरी देऊ शकणार नाही पण इतक मात्र नक्की की शब्द तुमच्या भावनांना आकार देतात, त्यांना तुमच्या आवाक्यात आणतात… आणि जश्या जश्या या भावना अधिक तरल, अस्तित्वाच्या जवळ जाणाऱ्या आणि कुठेतरी जीवनाचा अर्थ शोधण्याच्या जवळ जातात तेव्हा त्या भावना कवितेत आणि त्यापुढे गीतात मांडणे हे अत्यंत कठीण होऊन जाते …आणि येथेच आपल्याला भेटतात जगात झालेले अनेक महान कवी, गायक आणि गीतकार … आणि जेव्हा तुमच्यात या भावना उत्पन्न होतात आणि त्यांना आकार देणारे एखादे गाणे कानावर पडते तेव्हा ते गाणे तुमच्या जणू डीएनए चा एक भाग बनून जाते…आणि जेव्हा जेव्हा त्या भावना ट्रिगर होतील तेव्हा तेव्हा ते गाणे तुमच्या मनात तितक्याच ताकदीने वाजल्याशिवाय राहणार नाही…

अशीच एक गोष्ट माझ्या मनात कोरल्या गेलेल्या एका गाण्याची…जे खरेतर माझ्या मातृभाषेत नसून फारसी भाषेतील आहे व गाण्याचे शब्द हे ८०० वर्षांपूर्वी लिहिले गेले आहेत..

ऑगस्टचा महिना होता… एका फोटोग्राफी एक्सपीडिशन साठी माझ्या भावाच्या ग्रुप बरोबर लेह लडाख ला गेलो होतो. तसा मी एखाद्या ग्रुप बरोबर जाण्याचा प्रसंग खूप वर्षांनी आला म्हणजे कॉलेज नंतरच… आता चाळीशी जवळपास आली होती. अनुभवांचे गाठोडे काठोकाठ भरत आले होते… त्यातून लेह लडाख ची अगदी प्रिहिस्टोरिक वाटावी अशी टेरेन… उंचच उंच पण खडकाळ असे सुळके तर कुठे वाळवंट… थंड आणि रखरखीत कोरडे… पण मधूनच वाहत जाणारी एक महान नदी… जिच्यावरून आपल्या अख्या देशाच्या अस्तित्वाची ओळख पडली ती म्हणजे सिंधू नदी… हा सगळा नजरा कुठेतरी आयुष्याशी मेळ खात होता… उंचच उंच ध्येय आणि त्या कडे जाणाऱ्या रखरखीत खडकाळ वाटा. आणि या साऱ्यात आपल्या सोबत राहते ती म्हणजे युगानुयुगे वाहणारी अनेकांच्या लेखणीतून वाहिलेली मानवतेच्या महान तत्त्वांची एक विचारधारा… आपल्यातले माणूसपण जिवंत ठेवणारी… जणू ती सिंधू नदीच…

अश्या सगळ्या विचारांचा कल्लोळ मनात लाटेसारखा उचंबळत होता आणि होता होता शेवटचा दिवस आला. शेवटचा दिवस हा लेह चा जुना पुराणा बाजार बघायचा होता पण हे ग्रुपने जायचे नसून एकट्याने जायचे होते. मी ठरवले की कॅमेरा आज बाजूला ठेवायचा आणि फक्त जनसागरात डुबून जायचे. आणि बाजारात पाय ठेवताच सगळ्या भावना जणू एका बिंदूत एकत्र झाल्या आणि कानात आपोआप घुमू लागले, रुमी नि लिहिलेले आणि जगप्रसिद्ध कव्वाली गायक नुसरत फतेह अली खान यांनी गायलेले…

“न मन बेहूदा गिरदे कुचाओ बाजार मी गर्दम…”

… याचा अर्थ “ मी या बाजाराच्या गल्ली बोळात निरर्थक फिरत नाहिये…”

या गाण्याची थोडक्यात पार्श्वभूमी अशी आहे- “रुमीचा सद्गुरू शम्स हा रुमीला ज्ञान दिल्यानंतर अचानक एक दिवस गायब झाला काहिजण म्हणतात त्याचा खून झाला पण नक्की इतिहासाला माहीत नाही.. शम्सच्या विरहात रुमी अत्यंत दुःखी होता आणि असाच एक दिवस वेड्यासारखा तो त्याला शोधायला बाजारात गेला असता तिथे त्याच्या कानावर सोनाराच्या दुकानातून सोन्यावर ठोकल्याचे लयबद्ध आवाज आले आणि तिथे त्याला ही कविता स्फुरली व तो बेभान होवून नाचू लागला. “

आपणही असंच काहीतरी शोधतोय का आयुष्यात.. अगदी हाच विचार त्या वेळी माझ्या मनात दाटला आणि मनात हे गाणे वाजू लागले… किती फिरलोय आपण आयुष्यात, कुठे कुठे गेलोय किती माणस आयुष्यात आली आणि निघूनही गेली… काही काही मागे सोडून गेली…या सगळ्यांचा दुआ जोडू पाहतोय का… या सगळ्या अनुभवातून कोणी आपल्याला शिकवले… त्याला मी शोधतोय का?त्या प्रियकराला त्या प्रेयसीला मी शोधतोय का?… जी मला कधीच सोडून गेली नाही… वेगवेगळ्या जागी वेगवेगळ्या लोकात भेटतच राहिली… शिकवतच राहिली… जाणवतच राहिली तिची उपस्थितीही आणि अनुपस्थितीही…” मजाके आशिकी दारम पये दिदार मी गर्दम…” (एखाद्या आशिक सारखा मी त्याला शोधतोय)

…. आणि मीही बेभान होऊन त्या लेहच्या बाजारात त्या अनोळखी डोळ्यात ओळख शोधत फिरू लागलो…

शेवटी पाय थकले आणि डोळ्यात दोन अश्रुंचे थेंब जमा झाले,

… … एक रुमीसाठी आणि एक माझ्यासाठी…

आणि मनात गुंजली ती आर्त ओळ..

“बया जाना जानेजाना, बया जाना जानेजाना…”

 ये ना जानेजाना कुठे आहेस…. ये ना ….

© श्री आशिष मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “नावांची गंमत…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

??

☆ “नावांची गंमत…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

पूर्वी घरातल्या मुलाचं किंवा मुलीचं नाव आत्यानी काहीही ठेवलं असलं तरी त्या नावाने मुलाला हाक मारली जायची नाही. प्रत्येकाला वेगळंच एखादं टोपण नाव असायचं.

तेव्हा घरात चार-पाच मुलं असायची. पहिल्या मुलाचे नाव सहसा जे कुलदैवत असेल त्याचं ठेवलं जायचं. मला वाटते की त्यानिमित्ताने देवाचं नाव घेतलं जावं असा हेतु होता.

दत्तात्रय,पांडुरंग,खंडोबा वगैरे नावं ठेवली जायची. पण त्याचे अपभ्रंश होऊन दत्या, पांड्या, खंड्या अशीच हाक मारली जायची.

माझ्या मामाचे नाव ज्ञानेश्वर होते. त्याला ज्ञाना किंवा माऊली म्हटले जायचे. ते मात्र कानाला फार गोड वाटायचे.

माझ्या मोठ्या दिरांचे नाव नरसिंह आहे. उभ्या आयुष्यात त्यांना त्या नावाने कोणीही हाक मारली नाही. त्यांना बंडू हे टोपण नाव पडले होते. तेच सगळीकडे वापरले जायचे.

बाळू हे नाव पण त्या काळी फार प्रचलित होते. नंतर बाळू नाव फार पुढे गेले नाही. कारण नंतर बाळू हा शब्द.. “जरा यडाच आहे.. ” अशा अर्थाने वापरला जायला लागला.

यांच्या एका मित्राचे नाव तर बाळ असे आहे. अगदी एक्याऐंशीव्या वर्षी सुद्धा ते बाळच आहेत… आहे की नाही गंमत..

घरात धाकटं भावंड जन्माला आलं की ते मोठ्या भावाला दादा म्हणायचं. लाडाने त्याला दाद्या.. सुद्धा म्हटलं जायचे…. अजून मुलं झाली की त्यांना तात्या, आप्पा, अण्णा,भाऊ अशा नावाने बोलवले जायचे. ते इतके सार्वजनिक व्हायचे की सगळेजण त्याच नावाने त्यांना हाक मारायचे आणि तेच नाव त्यांना आयुष्यभर लागायचे.

यांच्या एका बहिणीला पोपट असे म्हणायचे.. का ते माहित नाही… गंमत म्हणजे ते नाव त्यांच्या इतकं अंगवळणी पडलं होतं की त्यांना त्याचं काही वाटायचं नाही.

एखादी मैना पण असायची..

” काय ग चिमणे ” असं माझ्या मैत्रिणीला कधीतरी लहानपणी म्हणे तिचे आजोबा म्हणाले होते..

आता साठीतही ती चिमणीच आहे.

एखादा बोका आणि माऊ पण असायची…

सोनुल्या,छकुल्या मोठेपणी सोनाबाई छकुताई होतात..

गोडुल्या मात्र गोडुल्याच राहतात.

ठकू,ठकी तसंच राजू आणि पप्पू पण असायचे…

राजा आणि राणी ही नावं पण बरीच वर्ष राज्य करत होती.

बंटी बबली पण त्यावेळेस जोरात होते.

यात सगळ्यात मोठा भाव खाल्ला ” बेबी “या नावाने … हे इतकं प्रसिद्ध झालं होत की प्रत्येक घरी एक तरी बेबी असायचीच.. म्हाताऱ्या झाल्या तरी त्यांना त्याच नावाने हाक मारायचे..

परवाच मी बहिणीला फोन केला तेव्हा म्हटलं,

“अगं तो बेबीचा नातू आहे.. “

त्याच्यानंतर माझी नात मला विचारत होती,

“आजी बेबीला नातु कसा काय झाला? “

मी हसायला लागले. म्हटलं, “अग बेबी सत्तर वर्षाची आहे”

तिला खूप वेळ हसू येत होत.

एका मागोमाग एक मुली झाल्या तर त्यांना आक्का, ताई असं म्हटले जायचे. मग अजून मुली झाल्या की ताईची मोठी ताई व्हायची आणि दूसरी छोटी ताई व्हायची.

नंतर इतकं मोठं म्हणायला नको म्हणून तिला सुटसुटीत छोटीच म्हणायला सुरुवात व्हायची.

परवाच आम्ही आमच्या नात्यातल्या छोटीच्या पंच्याहत्तरीला गेलो होतो.

काही वेळेस हौसेनी,कौतुकाने मोठी नावं ठेवली जायची. पण इतकं मोठं नाव कोण घेणार? 

मग सरस्वतीची सरू, निलांबरीची निला,गोदावरीची गोदा,कलावतीची कला आणि कुमुदिनीची कुमुद होऊन जायची.

अगदी तीन अक्षरी नाव असेल तर तेही पूर्ण उच्चारले जायचं नाही. मालतीचं मालु, शैलजाचं शैला, सुशीलाचं सुशी, नंदिनीचे नंदा,मिलिंदचे मिल्या, मंगेशचे मंग्या होऊन जायचं…

तसंच सुनेत्रा,सुमेधा,सुरेखा,या नावातला सु काढून टाकला जायचा.

त्यामुळेच मला वाटते नंतर हेमा, शांता, सुधा,लता, नंदा,नीता अशी सुटसुटीत नावं ठेवली गेली असावीत.

अर्थातच सीमा, मीना,गंगा, चंद्रा यांना हाक मारताना जर कोणी त्यांच्यावर रागवले असेल तर सीमे,मीने, गंगे,चंद्रे होऊन जात असे.

प्राणचा खलनायक इतका गाजला की कोणी कधी आपल्या मुलाचं नाव ” प्राण “ठेवलंच नाही.

रामायणातली “कैकयी” पण एकमेवच…

आमच्या नात्यात एकांना ओळीने पाच मुली झाल्या. मग त्यांनी म्हणे नवस केला की मुलगा झाला तर त्याचे नाव ” दगडू “ठेऊ..

नेमका मुलगा झाला. तो दगडूच राहिला… परत त्याचं काही वेगळंपण वगैरे कोणाला वाटायचं नाही. त्याला प्रेमाने सगळे दगडू म्हणायचे.

माझ्या एका मैत्रिणीचे नाव ” मनकर्णिका ” असे होते. ती या नावाला फार वैतागत असे. कारण या नावाने तिला कोणी कधीही हाक मारली नाही. तिचे मनू हेच नाव प्रचलित झाले.

लहानपणी लाडानी ” गुंड्या चांगलाच खोडकर आहे ” असं कोणी म्हटलं की त्याचं नाव “गुंड्याच” पडायचं.

काही वर्षांनी कानाला ते बरं वाटतं नसावं, मग त्याचा गुंड्याभाऊ झाला असावा…

चिंटू मात्र चिंटूच राहिला.

गंमत म्हणजे लाडाने ठेवलेल्या या टोपण नावात प्रेम, माया,आपुलकी असायची. त्यामुळे त्याचा राग कधी यायचा नाही. उलट त्यात आपलेपणा वाटायचा. म्हणूनच साठीला आलेला माझा पुतण्या प्रशांत म्हणाला की, ” अजूनही मला कोणी पशा म्हटलं की मला फार आवडतं.. लहानपण आठवतं. आता असं म्हणणारे पण खूप कमी झाले आहेत… “……

वय कितीही वाढलं तरी मनाला बालपणाची ओढ असतेच…

त्या नावातला स्नेह हवाहवासा वाटतो….

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

पुणे

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ फाटकी नोट… ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

??

☆ फाटकी नोट… ☆ श्री मंगेश मधुकर

कडक उन्हाळ्याचे दिवस, ऑफिसच्या कामासाठी भर उन्हात बाहेर पडावं लागलं. गाडी चालवायचा कंटाळा आला म्हणून रिक्षा केली. तासाभरात काम आटपून परत ऑफिसला निघालो दहा मिनिटं झाली तरी रिक्षा मिळेना. चार-पाच जणांनी ‘नाही’ म्हटलं. ऑनलाइन बुकिंग पण होत नव्हतं. चिडचिड वाढली. काही वेळाने एक रिक्षा थांबली. लाल रंगाचा शर्ट,जीन्स,मानेपर्यंत वाढलेले केस अशा हँकी-फिंकी तरुण ड्रायव्हरला पाहून खात्री झाली की नकार येणार पण तो चक्क तयार झाला. त्याचा विचार बदलायच्या आधी लगबगीनं रिक्षात बसलो.

“थॅंक्यु दादा,बराच वेळ थांबलो होतो. कोणी यायला तयार नव्हतं. ”

“रिक्षासाठी पॅसेंजर म्हणजे देव. त्याला नाही म्हणायचं नसतं” रिक्षावाल्याकडून अनपेक्षित उत्तर.

“तुमच्यासारखा विचार केला तर प्रॉब्लेमच नाही पण इथं प्रत्येकाला लांबचं भाडं पाहिजे. मोबाईल नाहीतर गप्पा मारत टाईमपास करतील पण कामं करणार नाही. ”

“काहीजण तर रिकामी गाडी चालवतात पण जवळचं भाडं घेत नाहीत. अशांमुळेच पब्लिक रिक्षावाल्यांना सरसकट शिव्या घालतं. ”रिक्षावाला मार्मिक बोलत होता. चांगलाच समजूतदार निघाला. गप्पांच्या नादात कधी उतरायचं ठिकाण आलं कळलचं नाही.

“एकशे तीन झालेत. ऑनलाइन पेमेंट करतो. ”मी

“साहेब,आजची भवानी तुमच्याकडूनच. कॅश असेल तर द्या. ”

“ओके” मी पाकीटात पाहिलं तर शंभरच्या तीन नोटा होत्या. एक नोट काढली पण त्याक्षणी मनात आलं की आपल्याकडची फाटकी नोट खपवावी म्हणून मधोमध फाटेलली पण चिकटपट्टी लावलेली नोट पुढे केली. रिक्षावाल्यानं आधी हँडलला मग कपाळाला लावून नमस्कार करून नोट खिशात ठेवली. त्यावेळी मी तीन रुपयांसाठी खिसे चाचपडत होतो.

“साहेब,राहू द्या ” 

“नाही असं कसं,कष्टाचे पैसे आहेत”

“पुन्हा भेटलो की द्या ” छान हसत त्यानं रिक्षा सुरू केली आणि काही क्षणातच दिसेनासा झाला.

मी एकटक पाहत राहिलो. पेहरावाच्या अगदी विरुद्ध टोकाचं रिक्षावाल्याचं आदबीचं बोलणं आणि वागणं यामुळे भारावलो. त्याच्याविषयी प्रचंड आदर वाटायला लागला आणि एकदम आपण केलेली घोडचूक लक्षात आली. अरे बापरे !! स्वार्थाच्या नादात काय करून बसलो. रिक्षावाला माझ्याशी चांगला वागला आणि मी काय केलं तर फाटकी नोट देऊन त्याला फसवलं. स्वतःची लाज वाटायला लागली. प्रचंड राग आला. अस्वस्थ झालो. काय करावं सुचेना दुसरी नोट देऊन चूक सुधारावी असं डोक्यात आल्यानं तिरमिरीत गाडी घेऊन निघालो.

काळ्या हुडची रिक्षा,नंबर माहिती नाही आणि लक्षात राहिलेला ड्रायव्हर, एवढ्या भांडवलावर शोधाशोध सुरू केली. चार-पाच चौक फिरलो. रस्त्यावरची प्रत्येक रिक्षा निरखून पाहत होतो. रिक्षा स्टँड,दुकानं,पान टपरीवर चौकशी केली पण उपयोग झाला नाही. खूप निराश झालो. अपराध भाव वाढला. फाटकी नोट बघितल्यावर तो भला माणूस आपल्याविषयी काय विचार करत असेल या जाणिवेनं बेचैनी वाढली. जवळच्या दोन-चार किलोमीटर परिसरातील जागांवर चकरा मारून अर्धा-पाऊण तासानं ऑफिसमध्ये आलो. चेहरा बघून सहकाऱ्यांनी “काय झालं” म्हणून विचारलं.

“काही विशेष नाही. नंतर सांगतो म्हणत बोलणं टाळलं आणि कम्प्युटर सुरू केला पण चित्त थाऱ्यावर नसल्यानं कामात लक्ष नव्हतं. वारंवार चुका व्हायला लागल्या.

“काय साहेब,तुमच्यासारख्या जंटलमनकडून ही अपेक्षा नव्हती” फाटकी नोट हातात घेऊन बोलणारा रिक्षावाला सारखा डोळ्यासमोर यायला लागला.

तब्येत ठीक नाही कारण देऊन ‘हाफ डे’ सुट्टी घेऊन घरी आलो. मला अवेळी आलेलं पाहून बायकोला आश्चर्य वाटलं पण तिनं लगेच काही विचारलं नाही. थोड्यावेळानं बायकोला घडलेला सगळा प्रकार सांगितल्यावर काहीच प्रतिक्रिया न देता ती एकटक माझ्याकडे पाहत राहिली.

“काय झालं असं का पाहतेस”

“साध्या साध्या गोष्टींचा किती त्रास करून घेतोयेस”

“तुला वाटती तितकी साधी गोष्ट नाहीये. एका चांगल्या माणसाला फसवलं”

“इट्स ओके,ठिक आहे. तुला चूक कळली. सुधारायचा प्रयत्न देखील केलास यातच सगळं आलं”

“अगं पण”

“असं होतं. ठरवून नाही परंतु एखाद्या क्षणी मोहाला भुलून जाणीवपूर्वक चुकीचं वागतो नंतर त्याचा खूप पश्चाताप होतो मग स्वतःलाच दोष देतो अशावेळी फक्त मनस्तापा शिवाय काही हाती लागत नाही. प्रत्येकाला हा अनुभव येतो ”.

“पण माहिती असूनही मी मुद्दाम वागलो याचाच जास्त त्रास होतोय. ”

“बास आता !! जे झालं ते झालं त्यावर उगीच जास्त विचार करू नकोस. आपल्याला मिळालेली फाटकी नोट दुसऱ्याच्या गळ्यात मारण्याचा प्रयत्न सगळेच करतात. म्हणून म्हणते तू फार मोठा गंभीर गुन्हा केलायेस असं काही नाही आणि शंभर रुपयांसाठी इतका त्रास करून घेतलाय तो पुरेसा आहे. ”

“रिक्षावाल्याचं नुकसान झालं ना”

“मग भरून देऊ. भरपाई म्हणून डबल पैसे देऊ. ”

“हा बरोबर. असंच करू”

“चल. त्याला पैशे देऊ आणि सॉरी सुद्धा म्हणू. ” बायको उपहासानं म्हणाली.

“पण तो भेटणार कसा? हाच तर मोठा प्रॉब्लेम आहे ना ” मी विचारलं.

“अरे सोन्या !!,एवढं कळतयं ना मग कशाला जीव जाळतोस. एक काम कर, त्याची मनापासून माफी माग म्हणजे बरं वाटेल आणि आता हा विषय सोडून दे. होतं असं कधी कधी….. ”

बायकोनं समजावल्यानं अपराधभाव बऱ्याच कमी झाला तरी सल कायम होती. बरोब्बर शंभर दिवस झालेत अजूनही तो रिक्षावाला भेटलेला नाही. कधी भेटेल ते माहिती नाही. मी मात्र अजूनही आशा सोडलेली नाही. या दरम्यान अजून एक फाटकी नोट पाकिटात आली. ती मात्र घरातच ठेवलीय…..

उगीच पुन्हा…..

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “तुझे आहे तुजपाशी – –” ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

☆ “तुझे आहे तुजपाशी – –” ☆ श्री जगदीश काबरे

मोगो नावाचा एक चिनी मुलगा. तो बिचारा दगड फोडायचं काम करायचा. हाताला फोड यायचे. उन्हातान्हात दगड फोडून अंगाला घामाच्या धारा लागायच्या. लोकांना कसली भन्नाट कामं करायला मिळतात आणि आपल्याच नशिबी काय ही दगडफोडी, असं तो नेहमी मनात म्हणे आणि दुःखी होई.

एकदा त्याचं दुखणं एका देवदुतानं ऐकलं. त्याचे दयावून त्याने त्याला विचारलं की, “का तू इतका उदास?”

मोगो म्हणतो, “देवानं माझ्यावर अन्याय केलाय. हे असलं काम दिलंय मला. तू विचार देवाला की, का त्यानं असं केलं?” 

देवदूत देवाकडं जातो विचारतो, “का या तरुणावर अन्यायकेला तुम्ही?” 

देव म्हणतो, “ठीक आहे. आजपासून त्याला जे काम आवडेल ते त्याला मिळेल. “

त्याच दिवशी मोगो दगड फोडताना एक श्रीमंत माणूस पाहतो. तो असतो हिर्‍यांचा व्यापारी. मोगोला वाटतं, ‘असं नशीब पाहिजे होतं आपलं. ‘ 

देवदूत तथास्तू म्हणतो आणि मोगो एकदम बडा व्यापारी होतो. एका महालात हिरे-जवाहरात लोळू लागतो. पण नेमका त्या वर्षी उन्हाळा फार असतो. काही दिवसात तो कंटाळतो. त्याला वाटतं, ‘या पैशाला काही अर्थ नाही. आपण थेट सूर्याइतकं पॉवरफूल व्हायला हवं. ‘

त्याच क्षणी त्याचं सूर्यात रूपांतर होतं… सर्वोच्च स्थान! सारं जग त्याच्याभोवती फिरू लागतं. उन्हाळा सरून पावसाळा येतो. ढग सूर्याला ग्रासून टाकतात. मोगोला तर पृथ्वीही दिसेनाशी होते. त्याला वाटतं, ‘सूर्यापेक्षा ढग जास्त पॉवरफूल आहे. ‘ 

मग काय तो ढग होतो… बरसतो. पण पाहतो तर काय, सगळं जग भिजतंय पण एक टणक खडक मात्र कोरडाच. पाण्यानं तो न फुटतो न हलतो. मोगो म्हणतो, ही खरी ताकद. त्याक्षणी तो खडक होतो.

काही दिवसांत एक माणूस येतो खडक फोडायला लागतो. मोगो पुन्हा ओरडतो आणि म्हणतो, ‘देवा मला खडक फोडणारा कर, तो खरा स्ट्राँग!’ 

झालं, मोगो पुन्हा दगडफोड्या होतो.

मग मोगो देवदुताला विचारतो, “म्हणजे मीच खरा पॉवरफूल आहे की काय?”

देवदूत हसतो आणि म्हणतो, “तुला मनापासून तुझं काम आवडलं, त्यात सुख वाटलं तर तूच खरा पॉवरफूल. नाहीतर तू कुणीही झालास तरी असमाधानीच राहशील. “

© श्री जगदीश काबरे

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ चल अकेला… चल अकेला… ☆ श्री सुनील शिरवाडकर ☆

श्री सुनील शिरवाडकर

? इंद्रधनुष्य ? 

☆ चल अकेला… चल अकेला… ☆ श्री सुनील शिरवाडकर

ओ. पी. नय्यर

“मी कंपोजर म्हणून जन्माला आलो.. कंपोजर म्हणुनच देह ठेवणार”

हे उद्गार आहेत ओ. पी. नय्यरचे. ओपीचा जन्म लाहोरचा. जगण्याची ऐट बघावी तर लाहोरमध्ये असा तो काळ. मदन गोपाल नय्यर या सरकारी हुद्देदाराच्या पोटी जन्माला आलेला हा मुलगा संगीत क्षेत्रात नाव काढील असं खरं तर कोणालाही वाटलं नसेल. लाहोरच्याच शाळेत तो शिकला. माध्यम उर्दू. अभ्यासात त्याचं लक्ष कधीच नव्हतं. छंद गाणी म्हणण्याचा.

असंच एकदा लाहोर रेडिओ वर गाणं म्हणण्याची त्याला संधी मिळाली. तेव्हा त्याचं वय होतं अवघं आठ.

… आणि मग त्याला रेडिओवर कामं मिळतंच गेली. कधी लहान मुलांच्या कार्यक्रमात तर कधी कोरसमध्ये. त्याकाळी लाहोर फिल्म इंडस्ट्री जोरात होती. त्याला एक दोन चित्रपटात कामेही मिळाली. घरच्यांचा अर्थातच विरोध. पोरगं वाया गेलं.. गाणं बजावण्याच्या मागे लागलं ही भुमिका.

तो मॅट्रीक झाला. जेमतेमच मार्क मिळाले. लाहोरमधल्या यथातथा कॉलेजमध्ये एडमीशन मिळाली. आता त्याला वेड लागले इंग्रजी चित्रपट बघण्याचे. त्यातील पात्रांचे रहाणीमान,स्टाईलच्या तो प्रेमात पडला. त्यानेही आपली स्टाईल बदलली. सिल्कचा फुल स्लीव्ह शर्ट, ट्राऊजर,पायात चकचकीत शुज,आणि डोक्यावर हैट.

देशाची फाळणी झाली आणि सगळंच बदलुन गेलं. तो मुंबईत आला. काही चित्रपट मिळत गेले. पण हवं तसं यश काही मिळत नव्हतं. पण ‘आरपार’ आला आणि ओपीचं नशीब बदललं. एकामागोमाग एक हिटस्. फिल्म इंडस्ट्रीने अक्षरशः त्याला डोक्यावर घेतलं. यश.. पैसा.. किर्ती कशालाच कमी नाही. मोती माणकांचा पाऊस पडत होता. ओपी म्हणतो..

माझ्या पुरुषार्थावर नियती भाळली. तिच्या जुगारी, लहरी स्वभावावर मी फिदा. आमचं हे ‘लव अफेअर’ दहा वर्ष टिकलं. ही दहा वर्ष मी अक्षरशः सोन्याचे मढवुन काढली. यश.. पैसा.. किर्ती.. सुंदर, बुध्दिमान ललनांचा सहवास.. सगळं सगळं उपभोगलं. यथेच्छ.

आणि मग त्याच्या लक्षात येत गेलं. मोठे निर्माते आपल्याला टाळताहेत. काही बी ग्रेड.. सी ग्रेड चित्रपट मिळाले. त्यातही एखाद दुसरं गाणं हिट जायचं.

ओपीने काळाची पावलं ओळखली. काही प्रॉपर्टीज विकल्या. शेअर्स मध्ये पैसे अडकवले. मरीन ड्राईव्ह वरचा प्रशस्त फ्लॅट ठेवला. देवाला विनवले..

शेवटपर्यंत माझी ऐट सांभाळ.

आणि मग तो फिल्म इंडस्ट्रीपासुन अलगदपणे दुर झाला. नवीन आयुष्य सुरु झाले. सकाळी जरावेळ हार्मोनियम घेऊन बसायचे. त्यानंतर देवाचा जप. एका वहीत तो ‘हरे राम हरे राम राम राम हरे हरे’ असं लिहीत. पण उर्दूत. ओपीला देवनागरी लिपी लिहीता वाचता येत नव्हती. कारण शिक्षण झालेलं उर्दू माध्यमात.

संध्याकाळ तो पेशंट तपासे. हो तो आता किंचितसा डॉक्टर झाला होता. झालं काय कि.. एकदा त्याला कसलासा त्रास होत होता. आशा भोसले आणि सुधीर फडके त्याला घेऊन गेले डॉ. फाटकांकडे. डॉ. फाटक होमिओपॅथीत निष्णात. त्यांच्या औषधाने ओपींना आराम वाटला. ओपीने डॉक्टरांचे शिष्यत्व पत्करले. होमिओपॅथीची ओळख झाली. आणि मग संध्याकाळी दोन तीन पेशंटस् तपासु लागले. पण मोफत.

फी साठी नाही.

कधी रात्री जेवण झाल्यावर मरीन ड्राईव्ह वर जाऊन बसावे.. तर कधी इंग्रजी चित्रपटाला. रिगल.. लिबर्टी.. इरॉस ही आवडती थिएटर्स. जायचं ते थाटात. एकदम चार पाच तिकिटं खरेदी करायची. आजुबाजुच्या खुर्च्या रिकाम्या. त्यावर कोट.. हॅट ठेवायची. पाय लांब करायचे.. आणि चित्रपट एंजॉय करायचा.

१६ जानेवारी म्हणजे ओपीचा जन्मदिवस. आदल्या दिवशी भरपूर मिठाया.. ड्राय फ्रुटस् आणुन ठेवायचा. दिवसभर चाहत्यांची गर्दी. पहिला बुके येणार एच. एम. व्ही. कडुन.

संध्याकाळी गाण्यांची मैफल जमायची कोणी कोणी येत.. ओपीची गाणी म्हणत. कधी सुरात.. कधीच बेसुरातही. पण ओपीला ते आवडे.

असेच एकदा एका नवोदित गायकाने गाणं म्हणायला सुरुवात केली.

‘चल अकेला.. चल अकेला.. ‘

आणि ओपीला तो दिवस आठवला……

एस. मुखर्जी ‘संबंध’ बनवत होते. गाणी होती कवी प्रदिप यांची. संगीत ओपी. त्यादिवशी प्रदिप यांनी गाणं लिहुन आणलं. हेच ‘चल अकेला.. चल अकेला.. ‘ आणि मुखर्जींकडे हट्ट धरुन बसले. याला चाल मीच लावणार.. गाणारही मीच.

ओपीने ते गाणं वाचलं. आणि त्यांच्या लक्षात आलं. प्रदिप या चांगल्या गाण्याचा विचका करणार. ते चिडले. आणि घरी निघून आले. ते गाणं डोक्यात घोळत होतंच. शब्द कसदार होते. अर्थ प्रवाही होता. पियानोवर बसले आणि एक अफलातुन चाल त्यांच्याकडून तयार झाली.

थोड्या वेळाने त्यांच्या मागोमाग प्रदिप आणि मुखर्जी ओपींकडे आले. त्यांची समजूत घालायला. आल्यानंतर प्रदिप यांनी ते गाणं.. ती चाल ऐकली आणि म्हणाले..

“ओपी तुम्ही माझ्या गाण्याचं लखलखतं झुंबर करुन टाकलंय”

ओपीने नंतर ते गाणं रेकॉर्ड केलं. मुकेशच्या आवाजात. वास्तविक मुकेश ओपीकडे फारसा गायला नाही. पण या गाण्यासाठी मुकेशच हवा हा आशा भोसलेचा हट्ट.

“या गाण्याचं मुकेश सोनं करील” 

हा आशाचा अंदाज सहीसही खरा ठरला.

————————————-

या गीतातील शब्द खरे ठरतील.. तेही आपल्या आयुष्यात हे ओपीला ठाऊकच नव्हते. निवृत्तीनंतरचं सुखासीन आयुष्य सुरु होतं. पण नशीब पालटलं. कौटुंबिक वाद सुरु झाले. प्रत्यक्ष बायको, मुलांनीच इस्टेटीवरुन त्याच्यावर दावा ठोकला. आणि ओपी कोसळला.

कोणताही विरोध न करता त्याने आपला फ्लॅट सोडला. अंगावरच्या कपड्यानिशी ओपी बाहेर पडला. सोबत घेतला फक्त हार्मोनियम.. जो त्याने लाहोरला पहिल्या कमाईतून घेतला होता. आणि घेतल्या नोटेशन्सच्या वह्या.

सगळं सोडुन दुर विरारला एका साध्या तीन खोल्यांच्या फ्लॅटमध्ये रहायला आला. दुर तिकडे लाहोरला पर्वत पहाडांच्या मुलखात जन्माला आलेला.. मुंबईत सागर किनारी स्थिरावलेला.. यश,किर्ती सगळं काही मिळवलेला ओंकार प्रसाद नय्यर. शेकडो गाणी ज्याने आपल्या सुरांनी मढवली.. त्याच्या आयुष्याची आता संध्याकाळ झाली होती. अगदी 

‘लागले नेत्र रे पैलतीरी’

ही अवस्था. वारंवार जुने दिवस आठवताना त्याच्या लक्षात आले..

मागे नसतं पहायचं आठवणीत शिरताना..

पावलं जड पडतात

तिथुन मागे फिरताना.

आणि मग साऱ्या जुन्या आठवणींना त्याने मागे सारले. आपला जुना.. लाडका हार्मोनियम पुढे ओढला. आणि तेच गीत पुन्हा पुन्हा आळवु लागला…

‘चल अकेला चल अकेला चल अकेला…

तेरा मेला पीछे छूटा राही चल अकेला.. ‘

© श्री सुनील शिरवाडकर

मो.९४२३९६८३०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘ज्वारी… लय भारी…’ ☆ श्री अ. ल. देशपांडे ☆

श्री अ. ल. देशपांडे

??

☆ ‘ज्वारी… लय भारी…’ ☆ श्री अ. ल. देशपांडे ☆

सध्या भाकर ही पंचतारांकित झाली आहे. ती आता श्रीमंताची झाली आहे. हुरडा देखील असाच item झाला आहे वगैरे गुणगान करणारी एक क्लिप wapp वर आली होती. ती वाचून मी देखील व्यक्त झालो खालीलप्रमाणे… 

ज्वारी लयभारी… तुम्हाला प्यारी तर आम्हाला सगी सोयरी… तरी सुखी असे माहेरी.

मटणाच्या रश्याबरोबरची तर मला ज्ञात नाही ( तुम्हालाही नसेलच ही खात्री ) पण रात्रीच्या जेवणासाठी तयार केलेल्या आणि रात्री बेरात्री अतिथी आलाच तर वेळेवर पिठलं करून वेळ साजरी व्हावी म्हणून आवेलाच्या मागे ताठ उभ्या असलेल्या भाकरी जर शिल्लक राहिल्या तर सकाळच्या लोणचं, कढवलेलं तेल व हाताने फोडलेल्या कांद्याबरोबरच्या चविष्ट न्याहरीची गोष्टच न्यारी.

उमरीच्या घरच्या गोदामाकडील अंगणात अखंड अग्निहोत्रासम धगधगणाऱ्या चूल-माऊलीच्या उदरात असलेल्या तप्त निखाऱ्यावर ज्वारीच्या पिठाच्या पानग्याला दोन्हीकडून पळसाची पाने लावून झोकून दिल्यावर तावून सुलाखून बाहेर आलेल्या पानग्याची चवच जगावेगळी.

शिळ्या भाकरी त्यावर तिळाची चटणी, तेल, आंब्याचं रायतं, दोन तीन कांदे स्वच्छ पालवात बांधून कुंभीपट्टीकडील झोरमळ्यावर ( नदीवर ) जाऊन त्या अन्नपूर्णा देवीच्या प्रसादावर ( भाकरीवर ) ताव मारण्याचा स्वर्गीय आनंद अपारच. जन्मांध असलेल्या आबईने केलेल्या चुलीवरील बेदाग, शुभ्र भाकरीचे देखणे पहात रहावेसे रूप अवर्णनीय.

रात्री नुकतीच सामसूम झालेली असायची. तसेच बारभाईचं ( धबडक्याचं) घर सोडलं तर इतरत्र उमरीला रात्री आठ म्हणजे निरव शांतता असायची. उकंडबाऱ्याच्या वाडीकडील गावकुसातून अनवाणी पायाने हळुवार चालत आलेली सखू शांतपणे फरसावरून आवाज द्यायची, ” भाकर हाय का मायजी ? “

तिचा हा अगतिक स्वर तिच्या घरातील त्यादिवशी उपाशी असणाऱ्या कुणासाठी तरी असायचा.

काकी किंवा माई सखूची हाक ऐकून चुलीच्या बाजूला उभ्या ठेवलेल्या भाकरीपैकी एक, दोन भाकरी कोरड्यासासोबत ( वरण, भाजी किंवा लोणचं) डेलजी ओलांडून फरसावर येऊन सखूने पसरलेल्या लुगड्याच्या पदरात हळुवार वाढून देत असत. याचक म्हणून आलेली सखू पण माऊली.. आणि तिची झोळी रिकामी न जाऊ देणारी पण माऊलीच. एकीकडे अगतिकता दुसरीकडे संपन्नतेचा अहंकार नाही.

अशी ही भाकर.

… अशीच एक संध्याकाळ संपून उगवलेली रात्र. सर्वांची जेवणं आटोपलेली. जेवणाची ओसरीला पोतेरं लागलेलं. दिवसभर कष्ट सोसलेली हाडं ( विशेषतः बायकांची ) सातरीवर पहुडण्याची वेळ झालेली.

दूरवरून कुत्र्यांचे भुंकणे कुंद असलेल्या शांततेचा भंग करणारे. अशात मारुतीच्या पाराजवळील शुभ्र दाढीधारी ‘ मलंग ‘ नावाचा फकीर पांडेबुवांच्या अंगणात, एका हातात लांब काठी, खांद्यावर झोळी दुसऱ्या हातात कंदील घेऊन उभा ठाकलेला. अंगणातील प्रचंड कडुलिंबाच्या पानांची सळसळ थांबलेली आणि

” हाज़ीर है तो दे दे मां ” असं आर्जव.

… परत पांडे बुवांच्या घरातील लक्ष्मीच्या कानावर पडलेले ते शब्द. चुलीवर ठेवलेली भाकर परत फकीराच्या झोळीत समाऊन गेलेली.

” तुमची जेवणं झालेली आहेत, काही शिल्लक असेल तरच द्या “, अशी अपेक्षा असलेला मलंग फकीर. त्यांच्या किंवा त्याच्या कुंटुंबीयांच्या पोटात जाणारी ही मोलाची भाकर.

… ईश्वरदत्त भूक. याचनेतही विनय. सहज भावनेने, निर्लेप मनाने दिलेली ही “भाकर”.

© श्री अ. ल. देशपांडे

अमरावती

मो. 92257 05884

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘माझी शिदोरी…’ भाग-१५ ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित ☆

सौ राधिका -माजगावकर- पंडित

??

☆ ‘माझी शिदोरी…’ भाग-१५ ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित

देवळांचे आणि विद्येचे माहेरघर असलेले पुणे..

पुणे नांवातच पुण्यभूमी आहे आणि पुण्याचा वेगळा असा स्वतंत्र इतिहासही आहे. कारण या शहराच्या अंगा खाद्यावर ऐतिहासीक खुणा आहेत. त्या काळात पुणे म्हणजे पेन्शनरांच शहर म्हणून ओळखल जायच. ‘ संध्या छाया भिवविती हृदया ‘ त्याला कारण एकटेपणा, पण अहो!अशी आजची पण तीच परिस्थिती आहे, पण वेळ कसा? कुठे? कुणाबरोबर? घालवायचा हा राक्षसासारखा भेसूर पणे ‘आ ‘ वासलेला प्रश्न, तेव्हां इतका बिकट नव्हता, कारण जिवाभावाच्या मित्रांबरोबर सुखदुःखाच्या गोष्टी सदाशिव पेठेच्या कट्ट्यावर आणि देवळांच्या पायरीवर बसून शेअर व्हायच्या. विद्येच माहेरघर म्हणून ओळखल जाणार हे शहर देवदेवतांच्या देवळानी भरगच्च भरलेल होत. कथा कीर्तन, काकड आरती, भजन यात माणसं एकरूप व्हायची. त्यामुळे गुंडगिरी खून दरोडे अशा कुविचारांचा ‘खच ‘कमी होता. शक्यतोवर सातच्याआत पोरी घरी पळायच्या. मवाली मुलांच्या मनांत शिवाजी महाराजांचा ‘परस्त्री मातेसमान’ हा बाणा ठसलेला होता.

नाना वाड्यावरून, हुतात्मा चौकातून पुढे गेल्यावर एक पुरातन मंदिर दुकानांच्या गर्दीत लपलय. गर्द केशरी कोरीव नक्षीकाम केलेल्या दरवाजामुळे आपली नजर तिथे स्थिरावते. आत पाऊल टाकल्याबरोबर समोर मारुतीच्या शेंदूरचर्चित मूर्तीचं दर्शन होत. शेंदुराच्या असंख्य पुटांमुळे मूळ मूर्तीचा अंदाज येत नाही. पुण्यातील चित्रविचित्र नांवात या मारुतीची गणना होते. कारण पूर्वी ह्या परिसरात ‘भांग’ विकली जायची म्हणून या मारुतीरायाच नामकरण झाल, ‘ भांग्या’ मारूती. पुण्यात ‘करळेवाडी, ‘ प्रसिद्ध होती खूप बिऱ्हाड होती तिथे, सोमणांच्या हॉटेलवरून ‘फिम्को शू’ दुकानावरून पुढे गेल की कमानदार दरवाज्याची ‘करळेवाडी’ लागायची. तिथून शिरल की एकदम दक्षिण मुखी मारुतीच्या पुढ्यातच आम्ही पोहोचायचो. आणखी पुढे गेल की यायचा शनिवार वाडा, अस वाटायचं मस्तानी महाल, पेशव्यांची बैठक, दिवाणखाना, पेशवीण बाईंचे दागिने, थाटाच्या वस्तू बघायला मिळतील पण कसल काय! आतला सगळाच नक्षा बदललेला होता. तिथून बाहेर पडल्यावर म्हणूनच मन खट्टू व्हायच. कारण पेशवाई थाटाचे काहीच अवशेष तिथे आढळले नाहीत. नारायण महालातून बाहेर पडतांना आम्ही कानांत बोटे घालायचो, असं वाटायचं नारायणाच्या किंकाळ्या ऐकू येतील की काय! हीच दहशत बालमनांत ठसली होती. वसंत टॉकीजला त्यावेळी नेहमी ऐतिहासिक पिक्चरच लागत असत. नारायणाच्या खुनाचा, सगळा इतिहास आठवत डोळे पुसतच आम्ही बाहेर पडायचो.

मग शनिवार वाड्याच्या बुरुजाला वळसा घालून यायच ते शनी मंदिरापाशी. शनीच्या मंदिरात सगळी कडे तेलच तेल होत, मूर्ती, भिंती, जमीन, कठडे हात लावीन तिथे तेलच तेल असायचं त्यावेळी’ हात लावीन तिथे सोनं ‘हा पिक्चर गाजला होता. आम्हाला मोठ्या माणसांनी बजावलं होतं की शनीचं दर्शन अगदी त्याच्या समोरून घेऊ नये, नाहीतर फटका बसतो. लहानपणी बालमनाला वाटायचं प्रत्यक्ष शनीच मूर्तीतून बाहेर येऊन फटका मारतो की काय! आता हंसू येतेय पोरकट वयातले विचारही पोरकटच असतात नाही का. आम्ही मैत्रिणी एकमेकींना ढकलत कोपऱ्यात सरकायचो जमिनीवर सांडलेल्या तेलामुळे घसरगुंडी झालेली असायची. माझी मैत्रीण सुनंदा सटकन घसरली. ‘घालीन लोटांगण वंदिन शनिदेवा तुझे चरण. ‘अशीस्थिती झाली तिची. आणि तिने डोळे पांढरे केले, दोघी तिला धरायला आणि दोघी शनी महाराजांच्या विनवण्या करायला धावल्या, शनीदेव पावले. आणि सुनंदा शुद्धीवर आली. पण नंतर मात्र ती शनीमंदिराला ‘ दुरून डोंगर साजरे’ असं म्हणून रस्त्यावरून नमस्कार करायला लागली. आता मंदिर खूप स्वच्छ झालंय. पण त्यावेळी मात्र ‘आवजाव मंदिर तुम्हारा, असं होत. सगळेच अगदी मूर्ती जवळ जाऊन शनीला तैलस्नान घालायचे. भक्तांची ही श्रद्धा पुजाऱ्यांना फार महागात पडायची. कारण तिथे बसून तेही तेल्या मारुती झालेले असायचे. त्यामुळे मंदिरात बसताना गणवेशासारखा त्यांचा ड्रेस ठरलेला असायचा. त्यांच्या तुंदीलतनु अवताराकडे बघून आम्हाला हंसू यायचं. पाय घसरून पडणाऱ्या लोकांकडे बघितल्यावर तोंडावर हात ठेऊन हंसू दाबाव लागायचं पोटात मात्र हंसण्याच्या उकळ्या फुटलेल्या असायच्या. ‘जपून टाक पाऊल गडे’ असे म्हणत आम्ही एकमेकींचा हात धरत पुढे सरकायचो. तर मित्र-मैत्रिणींनो अशी होती ही शनि मंदिरा तुझी कहाणी.  शनिमहाराज की जय.

– क्रमशः …  

© सौ राधिका -माजगावकर- पंडित

पुणे – 51  

मो. 8451027554

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ आनंदाचे डोही… ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? मनमंजुषेतून ?

☆ आनंदाचे डोही…  ☆ श्री सुनील देशपांडे

सध्या वयाच्या पंचाहत्तरी मधून मार्गक्रमण चालू आहे. ७५ नंतर पूर्वी वानप्रस्थाश्रम असे म्हणत. हळूहळू व्यावहारिक जगतापासून दूर होणे जमले पाहिजे. किंबहुना जीवनातील व्यवहारांपासून दूर होता आले पाहिजे असे म्हणणे जास्त संयुक्तिक ठरेल.

‘आता उरलो उपकारापुरता’ असे पूर्वी म्हणत पण आता म्हणावेसे वाटते ‘आता उरलो समाजापुरता. ’ मृत्यूनंतर हळूहळू सगळे आपल्याला विसरतातच. परंतु या वयापासून जिवंतपणी सुद्धा माणसे विसरू लागतात.

माझे सासरे एकदा मला म्हणाले ‘ मी मेल्यावर तुम्ही माझ्याविषयी चार चांगले शब्द बोलाल. माझ्यावर कविता कराल. पण ती ऐकायला मी कुठे असेन ? त्याचा काय उपयोग? माझ्याबद्दल तुम्हाला काय वाटते याबद्दल माझ्यावर एक कविता जिवंतपणी करून मला ऐकवा तेवढी माझी शेवटची इच्छा समजा’ खरोखरच मी दुसऱ्याच दिवशी त्यांच्यावर कविता लिहून त्यांना ऐकवली. त्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान आणि आनंद पाहणे हा एक स्वर्गीय अनुभव होता.

मला आता सर्वच परिचितांना सांगावेसे वाटते. ज्यांना प्रेमापोटी नाती जपायची आवड व इच्छा असेल त्यांनी मला प्रत्यक्ष भेटण्यासाठी कधीतरी येऊन जावे.

‘सुनील गेला’ असा फोन येईल तेव्हा तुम्ही ‘ताबडतोब निघतोच आहे’ असे म्हणून गडबडीने यावयास निघाल हे मला नको आहे. मुळातच मी देहदानाची इच्छा व्यक्त केलेली असल्यामुळे मृत्यूनंतर कोणी भेटायला यावे इतका वेळ असणारच नाही. दुसरे म्हणजे मृत्यूनंतर ‘भेटणे’ शक्यच नाही. त्याला आपण पारंपरिक भाषेत दर्शन म्हणतो. हे कसले दर्शन? माणसाचे जिवंतपणी दर्शन न घेता मृत्यूनंतर दर्शन घेणे हे विडंबन आहे असे मला वाटते. मृत्यूनंतर सहा तासाच्या आत देहदान करावयाचे असते. त्यामुळे अगदीच जवळचे चार नातेवाईक किंवा मित्र यांनी ती इच्छा पूर्ण करण्यासाठी यावे याशिवाय त्यात दुसरे काही साध्य नाही.

माझ्या एका मित्राच्या सासर्‍यांनी जिवंतपणी श्राद्धविधी अर्थात ‘साक्षात स्वर्ग दर्शन’ या नावाचा विधी त्यांचे गावी केला. सगळ्यांच्या गाठीभेटी गळाभेटी आणि सहभोजन असा मस्त समारंभ करण्यात आला. हीच आपली अंतिम भेट म्हणून सर्वांचा निरोप घेतला. त्यानंतर काही वर्षांनी त्यांचा प्रत्यक्ष मृत्यू झाला आणि देहदान सुद्धा झाले. ही संकल्पना मला खूप भावली.

परंतु एखादा दिवस ठरवून त्या दिवशी सर्वांना बोलावणे हा इतरांच्या सोयी गैरसोयीचा भाग असतो. बऱ्याच वेळा इच्छा असून सुद्धा तो दिवस सोयीचा नसतो. तसेच खूप जास्त माणसे एका वेळेला जमली की कुणाशीच नीट संवाद होत नाही.

म्हणूनच मला असे म्हणावेसे वाटते…. 

… वर्षामध्ये जेव्हा केव्हा जमेल, शक्य होईल तेव्हा येऊन भेटावे.

अर्थात त्यात औपचारिकता नको. जुळलेले भावबंध असतील तरच भेटीत आनंद असतो.

सोशल मीडियावर मेसेज टाकून मी जिवंत असल्याची खबरबात सातत्याने देत असतोच.

अर्थात मृत्यू कधी कोणाला सांगून येत नसतो. कोणत्या क्षणाला तो येईल कुणी सांगावे? म्हणूनच  मी गुणगुणत असतो…..

… ‘ न जाने कौनसा पल मौत की अमानत हो, हर एक पल की खुशी को गले लगाते चलो ’.

त्यामुळे प्रत्येक क्षणाक्षणाचं सुख मी उपभोगत असतो. कुणाच्या येण्याने त्या सुखाला आणखी एक आनंदाची झालर लाभेल.

….. जे काही आयुष्याचे क्षण शिल्लक असतील त्या क्षणांमध्ये अधिकाधिक आनंद जोडता यावा आणि जिवंतपणीच स्वर्ग सुखाचा अनुभव घेता यावा ही मनापासून इच्छा.

‘ जीवन है अगर जहर तो पीना ही पडेगा ’.. या अनुभवापासून दूर होत.

आता फक्त अनुभूती हवी आहे… 

… ‘आनंदाचे डोही आनंद तरंग…’

© श्री सुनील देशपांडे 

 फोन :९६५७७०९६४०

 ई मेल : [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “सुखांचे शाॅटस्…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

??

☆ “सुखांचे शाॅटस्…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

रोजच्यासारखी सकाळी शारदा कामाला आली. आल्या आल्या म्हणाली,

“वहिनी हे बघा पैंजण.. शंभर रुपयांना घेतले. काल दारावर एक माणूस आला होता विकायला”

 तिच्या चेहऱ्यावरचा आनंद लोभसवाणा होता… आज एकदम खुषीत होती.

“अगं किती छान आहेत.. थांब शारदा फोटो काढते.. “

“नको नको”.. ती लाजून म्हणाली

“अग तुझा नाही.. पैंजणाचा काढते मग तर झालं…. “

फोटो काढला… फोटो काढताना ती हसत होती.

पैंजणावरून प्रेमानी हात फिरवून शारदा कामाला लागली…

तिच्या पैंजणांचा छुमछुम नाद तिच्याबरोबर मलाही सुखावत होता…

दिवसभर अनेक घरात कामं करूनही ती नेहमी आनंदात असते…

माझ्याही दिवसाची छान सुरुवात झाली…

 

देवाची पूजा करताना बाप्पाला गुलाब अर्पण केला… सरूची आठवण आली…

काळी सावळी तरतरीत सरू मी गेले की ” या काकू” म्हणते. मी नेहमी तिच्याकडूनच देवासाठी फुलं घेते. काल फुलं घेतली तर एक टपोरा गुलाब देऊन म्हणाली

” काकू हा घ्या तुमच्या देवाला “

.. मनात आलं किती गोड निरागस मन आहे पोरीचं…. देवाला हात जोडले त्याला मनोमन प्रार्थना केली..

“ पहाटे पासून दिवसभर कष्ट करणाऱ्या सरूला सुखी आणि आनंदी ठेव बाबा.. “

 

साहिलच्या म्हणजे नातवाच्या शाळेत फन फेअर होतं. तिथे त्यांचा पाणीपुरीचा स्टॉल होता. तो बघायला निघाले होते. रिक्षा बघत उभी होते…

काल साहिलने सांगितले होते.. “आजी आम्ही” चीझ रगडापुरी” करणार आहोत”

“अरे पण असं कसं? रगडापुरी वर चीझ?…. असं कुठे कोणी कधी केलं नसेल… कशी चव लागेल रे “

“नसेल केलं… पण आमचं तसंच ठरलं आहे… आणि पाणीपुरीवर नेहमीचं चिंचेचे पाणी नाही तर आम्ही त्यात थम्सअप, फॅन्टा, किंवा स्प्राईट घालणार आहोत… त्याला आम्ही “पाणीपुरी शॉटस् “असं नाव दिले आहे”

मी म्हटलं, “अरे हे कसलं कॉम्बिनेशन? कोणी तरी खाईल का?”

“अगं टीचर म्हणाल्या तुम्हाला करावसं वाटतंय ना करून बघा…. शिवाय आम्ही चिंचेचं पाणी पण घेऊन जाणार आहोत. लोकांना नाही आवडलं तर ते घालून नेहमीची पाणीपुरी करणार. “

 

काय झालं असेल… मी विचार करत होते तेवढ्यात..

“नीता. “.. अशी हाक आली

मैत्रीण दुकानात आईस्क्रीम घेत होती. बाईसाहेबांनी स्वेटर घातला होता आणि घेत होती आईस्क्रीम…

विचारलं तर म्हणाली.. “थंडीतच आईस्क्रीम खायला मजा येते.. ही घे तुला एक कॅंन्डी जाताना खा”

” अग आत्ता.. नको नको. नातवाच्या शाळेत चालले आहे “

तर डोळा मारून म्हणाली, ” घे ग.. वन फाॅर द रोड…. एन्जॉय इट.. कोणी…. तुझ्याकडे बघत नाही…. “

.. आयुष्यात प्रथमच रिक्षात बसून आईस कँन्डी खाताना मला गंमत वाटत होती….

 

फन फेअरला शाळेत पोचले तर तिथे खूपच मज्जा चालली होती… 

नातवाच्या स्टॉलवर गर्दी उसळली होती. लोक धमाल करत होते. पाणीपुरी शॉटस् हिट झाली होती…

आई, बाबा, आजी, आजोबा, पोरं… सगळे हसत होते. ट्राय करून बघत होते…

साहिलचे मित्र मैत्रिणी चीझ रगडा पुरी, पाणीपुरी शाॅटस बनवत होते. ते पण लोक आवडीने खात होते…

“कसली भारी आयडिया आहे ना… वाॅव….. मला अजून एक दे रे… एक्सलंट.. ए तु पण ट्राय कर रे… ” वगैरे चाललं होतं…

इतकी गर्दी होती की नातवाला आमच्याकडे बघायलाही वेळ नव्हता. काही वेळाने हे आणि सुनबाईचे आई-वडील पण आले. आम्ही चौघेही गप्पा मारत बसलो.

.. खूप वेळानंतर साहिल सांगायला आला,

” बघ आजी तुला काळजी वाटत होती ना पण… सगळ्यांना खूप आवडलं… आमचं एकुणएक सगळं संपलं. “

“हो रे.. आम्ही तुला बघीतलं तुमची गडबड चालली होती “

” अग पण तुम्हाला शॉट्स नाही मिळाले.. आता उद्या घरी करू.. तेव्हा तू ट्राय कर… “

“चालेल रे…. ” त्याला सांगितले.

पोरं अगदी खुष होती.

मनात म्हणाले…. “ नाही रे राजा…. उलट आज मला सुखांचे शॉट्स मिळाले.. ते कसे घ्यायचे हे समजले

.. त्याची चव दुय्यम होती.. मुलांचा आनंद महत्त्वाचा होता “ 

 

खरंच अशा छोट्या छोट्या शॉट्सनीच जीवनाची मजा घ्यायला शिकू… सारखं मोठं काहीतरी होईल मग मी सुखी.. आनंदी होईन असं म्हणत बसलं की हे छोटे शॉटस् हातातून निसटून जातात… हे समाधानाचे असे क्षण मनात भरून घ्यायचे… आणि मुख्य म्हणजे नेमके समाधान कशात मानायचे हे आपले आपण ठरवायचे मग असे क्षण सापडतात…

 

खरं म्हणजे ते असतातच आसपास… बघायचे ठरवले तर दिसतात..

बघायचे…. हळूहळू येईल ती दृष्टी…. मग दिसतील…. आपले आपले सुखांचे असे शॉटस्

 

मग ठरलं तर…

अशा शॉट्सची मजा घेत जगायचं.. आनंदाने… हसत हसत..

…. मग पुढचे दिवस, महिने आणि वर्षही नक्कीच आनंदात जातील.

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares