मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मी मतदार — भाग – ३ ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? मनमंजुषेतून ?

☆ मी मतदार — भाग – ३ ☆ श्री सुनील देशपांडे ☆

मी गोंधळलेला.

मग एकाने मला पटवून दिलं पक्ष बघून मत द्या उमेदवार बघून नको.

एकूण परिस्थिती बघता समजा पक्ष म्हणून मत दिलं तर तो उमेदवार त्या पक्षात राहील का? तो पक्षच त्या पक्षात राहील का? तो पक्षच दुसऱ्या पक्षात सामील होणार नाही का ? त्या पक्षाची फाटा फूट होऊन वेगवेगळ्या विचारसरणीचे अनेक पक्ष त्यातून निर्माण होणार नाहीत का ?

मग त्यात मी पुन्हा कोणाला मत द्यायचं? आत्ता दिलेलं माझं मत वाया गेल्यास त्याचं काय ? खरं म्हणजे सगळंच कन्फ्युजन आहे.

आज जे पक्षाचे धोरण आहे तेच धोरण उद्या असेल का? कशाचाच कशाला काही मेळ लागत नाही. आज जे नेते पक्षाबद्दल त्या धोरणाबद्दल खूप भरभरून चांगलं चांगलं बोलतात ते पुन्हा काहीतरी वेगळी भूमिका घेणार नाहीत का? मग माझं मत वाया जाईल ना ?

त्यापेक्षा मतदान न केलेलं काय वाईट ?

पण मग मी मतदानच नाही केलं तर जे मतदान करतील ते सगळे पैसे घेऊन भ्रष्ट पद्धतीने मतदान करणारेच बहुसंख्य असतील. मग भ्रष्ट व गुंड प्रवृत्तीचा माणूस निवडून येणे हे 100% नक्की. मग मी आणि माझ्यासारख्या अनेकांनी मतदान न करणं ही चूक झाली असं होणार नाही का ?

मी गोंधळलेला.

पूर्णपणे कनफ्यूज्ड.

© श्री सुनील देशपांडे

नाशिक मो – 9657709640 ईमेल  : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ बहिणाई ☆ श्री सुनील शिरवाडकर ☆

श्री सुनील शिरवाडकर

??

☆ बहिणाई… ☆ श्री सुनील शिरवाडकर

  

जो असतो परंतु दिसत नाही तो देव..

आणि जे दिसतं परंतु कधीच नसतं ते भेव”

ह्या ओळी लिहिलेल्या आहेत कवियत्री बहिणाई चौधरी यांनी. बहिणाईंच्या कितीतरी गाण्यांमधुन त्यांची देवावरील निस्सीम भक्ती समजते.पण त्यांचा देव केवळ दगडाच्या मुर्तीत नव्हता.त्यांचा देव निसर्गात..शेतामध्ये.. पिकांमध्ये होता.शेतात आपण लावलेली रोपे हळूहळू मोठी होऊ लागतात.. त्याची पाने वाऱ्यावर डोलू लागतात. आणि बहिणाई बोलू लागतात..

टाया वाजवती पानं

दंग देवाच्या भजनी

जमिनीची मशागत करताना त्यांनी उघड्या डोळ्यांनी अनेक क्षण टिपले. त्या पाखरांवर..जनावरांवर माया करतात. पाऊस म्हणजे तर त्यांचा जीवाभावाचा सोबती.

आला पाऊस पाऊस

शिपडली भुई सारी

धरत्रीचा परीमय 

माझं मन गेलं भरी

आला पाऊस पाऊस

आता सरीवर सरी

शेतं शिवारं भिजले

नदी नाले गेले भरी

घरी दारी..कामात.. विश्रांतीत..सुखात.. दुःखात त्यांनी जे जे अनुभवले, त्याचे प्रतिबिंब त्यांच्या काव्यात उमटले.

कवियत्री इंदिरा संत म्हणतात..

बहिणाईंच्या कविता वाचताना पार्श्वसंगीता सारखी माझ्या मनात एक कल्पना नेहमी उभी असते.

आपण झुळझुळ वाहणाऱ्या निर्मळ प्रवाहाच्या काठाशी बसलो आहोत. आणि तळातील रंगीबेरंगी रेती,दगडगोटे आणि प्रवाहाचे तरंग यात अगदी गुंतुन जात आहोत.

आणि खरंच.. बहिणाईंच्या कविता वाचताना आपण त्यात अगदीच गुंतुन जातो.. गुंगून जातो.

बहिणाईंच्या कविता आपल्याला माहीत असतातच..पण त्यांच्या नेहमीच्या बोलण्यात देखील उपमा.. अलंकाराची रेलचेल असायची.

आसु नाही ती सासु कशाची?

आसरा नाही तो सासरा कशाचा?

आता सध्या जे करोनाचे संकट जगावर आले आहे.. तसेच शंभर वर्षांपूर्वी प्लेगचे आले होते. बहिणाईंनी ते दिवस बघितलेले…

त्या लिहीतात..

पिलोक पिलोक,आल्या पिलोकाच्या गाठी

उजाडलं गाव, खया-मयामधी भेटी

पिलोक पिलोक,आली नशिबात ताटी

उचललं रोगी

त्यानं गाठली करंटी

करंटी म्हणजे क्वारंटाईन. तेव्हा सरकार शंका आली की उचलून क्वारंटाईन मध्ये टाकत असत. (खरंतर आजही ते तेवढंच गरजेचं आहे).

सध्या करोना मुळे आपण सर्वच जण सक्तीच्या सुटीवर आहोत. आणि म्हणूनच काही जुनी पुस्तके.. काव्यसंग्रह बाहेर निघताहेत.बहिणाईंच्या कविता वाचताना आपण नकळतपणे शंभर वर्षापुर्वीच्या काळात जातो.

माझ्यासमोर जो बहिणाईंचा काव्यसंग्रह आहे..त्याला प्रस्तावना आहे आचार्य अत्रे यांची. पहिल्या आव्रुत्तीची एक आणि दुसर्या आव्रुत्तीची एक.त्या वाचल्यानंतर बहिणाईंच्या काव्यातील गोडी अधिकच जाणवते.

यात कवी सोपानदेव चौधरी यांनी आपल्या आईबद्दल लिहीलेले दोन दिर्घ लेख आहेत कवियत्री इंदिरा संत.. पद्मा लोकुर यांनी बहिणाईंच्या काव्याचे केलेले रसग्रहण आहे.थोर विदुषी प्रा.मालती किर्लोस्कर यांनी लिहीलेला लेख आहे.

बहिणाईंवर लघुपट बनवणारे चित्रपट महर्षी वसंतराव जोगळेकर. त्यांना हा लघुपट बनवताना उमजलेल्या बहिणाई.. त्यांनी एका लेखातून आपल्या समोर उभ्या केल्या आहेत.

आणि या सर्वांपेक्षा जास्त मनाचा ठाव घेते ती एक कविता. बहिणाईंवरच केलेली. त्याचे कवी आहेत.. बा.भ.बोरकर.

त्यांच्याच शब्दात या लेखाचा समारोप करतो. बहिणाई चौधरींना ते म्हणतात..

देव तुझ्या ओटीपोटी

देव तुझ्या कंठीओटी!

दशांगुळे उरलेला

देव तुझ्या दाही बोटी!

© श्री सुनील शिरवाडकर

मो.९४२३९६८३०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मी मतदार — भाग – २ ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? मनमंजुषेतून ?

☆ मी मतदार — भाग – २ ☆ श्री सुनील देशपांडे ☆

मी गोंधळलेला.

मी ठरवलं नोटाचा काही उपयोग नाही. आपण असं करावं का? जे काही उमेदवार उभे आहेत त्यापैकी त्यातल्या त्यात जो बरा उमेदवार असेल त्याला मत द्यावं ? दगडापेक्षा वीट मऊ !

क्र. एक – उमेदवार ज्या पक्षाचा आहे तो पक्ष कधीच सत्तेवर येऊ शकणार नाही. पण सत्तेसाठी अथवा पैशासाठी तो पक्ष दुसऱ्या पक्षाशी संगणमत करू शकेल. मग कशाला मत द्यावं ? आणि का ?

क्र. दोन – हा चांगला असला तरी तो निष्क्रिय आहे कधीच काही काम करत नाही. फक्त निवडून येतो. किंबहुना तो काही काम करत नाही म्हणूनच तो बरा आहे असं वाटतं का ? याला मत देण्यात काय अर्थ आहे ?

क्र तीन – समजा हा चांगला म्हणजे त्यातल्या त्यात बरा आहे. (कारण जो खरंच चांगला असतो तो निवडणुकीचा उमेदवार होईपर्यंत मोठा होतच नाही. किंवा राजकारणात सुद्धा येत नाही) पण त्याच्या पक्षाची धोरणं ही चुकीची आणि देशाला अयोग्य दिशेने नेणारी आहेत, असं माझं मत असेल तर, याला मी का मत द्यावं ?

क्र चार – हा उमेदवार वाईट आहे परंतु त्याचा पक्ष चांगला आहे त्या पक्षाची धोरणे चांगली आहेत मला ती योग्य वाटतात पण या माणसाला मी मत का द्यावं ?

मी गोंधळलेला.

पूर्णपणे कनफ्यूज्ड.

© श्री सुनील देशपांडे

नाशिक मो – 9657709640 ईमेल  : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ बस, छोरी समझके ना लढियो…!  ☆ कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त) ☆

कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त)

परिचय :

कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त)

(बी एससी, बी टेक, एलएलबी, एमपीएम, एमबीए)

  • एनडीए आणि आयएमए मध्ये प्रशिक्षणानंतर १९८१-२००७ सैन्यदलात इंजिनियर. 
  • SSB मधील सेनाधिकारी निवडप्रक्रियेत चार वर्षे सहभाग. 
  • २००७ ते आजपर्यंत खाजगी कंपन्यांचे अधिकारी-कर्मचारी आणि केंद्र व राज्य सरकारी अधिकाऱ्यांना विविध विषयांमध्ये प्रशिक्षण देण्याचा व्यवसाय.
  • छंद – लेखन, वाचन, संगीतश्रवण, प्रवास.

? मनमंजुषेतून ?

बस, छोरी समझके ना लढियो…!  ☆ कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त) ☆

१९९७ साली, पुण्याच्या एका सिग्नल युनिटमध्ये मी काम करीत होतो. राजस्थान बॉर्डरवरची टेलिफोन एक्सचेंजेस बारा महिने चालू अवस्थेत ठेवण्यासाठी, आमच्या काही छोट्या तुकड्या तेथेच वास्तव्याला असत. कंपनी कमांडर या नात्याने, त्यांच्या कामाच्या देखरेखीसाठी अधून-मधून मला पुण्याहून तेथे जावे लागे. 

माझ्या कंपनीत, मी आणि लेफ्टनंट गीता असे दोनच अधिकारी होतो. मी पुण्याबाहेर असल्यास आमच्या कंपनीचा दैनंदिन कारभार गीता उत्तम प्रकारे सांभाळत असे. 

वार्षिक युद्धसरावासाठी वर्षातून किमान एकदा, संपूर्ण युनिटला बॉर्डरवर हलवावे लागे. त्या काळात, पुण्याहून बॉर्डरपर्यंतच्या प्रवासाचे नियोजन, सर्व उपकरणे, व इतर सामानाच्या बांधाबांधीवर देखरेख, CO साहेबांसोबत चर्चा, मीटिंग्स अश्या उपद्व्यापात माझी खूपच धावपळ चालू असे. 

एकदा, मी अश्याच गडबडीत होतो आणि दुपारच्या जेवणाची वेळ होत आली होती. माझ्या लक्षात आले की तो जवानांच्या पगाराचा दिवस होता. मीटिंगला जाता-जाता मी गीताला सांगितले की पगाराची सर्व रक्कम मुख्य ऑफिसातून आणवून जवानांना पगार वाटण्याचे काम तिने पूर्ण करावे. ते काम सहजच तास-दीड तासाचे होते. 

गीताला आदेश देऊन मी पुढच्या कामासाठी बाहेर पडणार तेवढ्यात तिच्या चेहऱ्याकडे माझे लक्ष गेले. ती जरा अस्वस्थ आणि विचारमग्न दिसली. मी मागे वळलो आणि तिला विचारले, “काही प्रॉब्लेम आहे का गीता?”

ती गडबडीने उठून मला म्हणाली, “नाही नाही सर, काही प्रॉब्लेम नाही. मी लगेच कामाला लागते.” 

पण, माझे समाधान झाले नाही. कोणतेही काम केंव्हाही चालून आले तरी नाराज होणे हा गीताचा स्वभाव नव्हता.

मी पुन्हा खोदून विचारल्यावर ती म्हणाली, “सर, मी पगाराचे काम संपवूनच घरी जाईन. पण, एक विनंती आहे. आज संध्याकाळी गेम्स परेडसाठी मी नाही आले तर चालेल का? 

सर, चार महिन्यांपूर्वी लग्न झाल्यानंतर, काल प्रथमच माझे सासू-सासरे माझ्याकडे काही दिवसांसाठी आलेले आहेत. अजून पक्के घर न मिळाल्याने आम्ही दीड खोलीच्या टेम्पररी घरातच राहत आहोत. किचनच्या नावाने, गॅस ठेवण्यापुरते एक टेबल फक्त आहे. जगदीप [गीताचा आर्मी ऑफिसर नवरा, जो त्यावेळी पुण्यातच कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनियरिंग (CME) मध्ये पुढील शिक्षण घेत होता] परीक्षेच्या अभ्यासासाठी दिवसभर CME मध्येच असतो. घरी गेल्यावर गरम रोट्या बनवून सासू-सासऱ्यांना जेवू घालेपर्यंत उशीर होईल. म्हणून मी थोडी सवलत मागितली, इतकेच.”

एक अधिकारी, आणि नवीन लग्न झालेली सून, अश्या दुहेरी भूमिकेत असलेल्या गीताचा प्रॉब्लेम माझ्या लक्षात आला. मी तिला सांगितले, की तिने वेळेवर घरी निघून जावे आणि संध्याकाळच्या परेडसाठीही येऊ नये. पगारवाटपाचे काम मी स्वतः करेन, कारण माझ्या घरी स्वयंपाक करण्याची जबाबदारी माझ्यावर नव्हती.

पण, गीता माझी धावपळ देखील पाहत होती. संध्याकाळी तिला परत यायचे नसल्याने पगारवाटपाचे काम केल्याशिवाय ती घरी जाणार नाही, असे तिने स्पष्टपणे सांगितले. तिच्या चेहऱ्यावर स्वाभिमान, कृतज्ञता आणि माझ्याप्रति असलेली आस्था असे तीनही भाव मला स्पष्ट दिसले आणि तिच्याबद्दल माझ्या मनात असलेला आदर वाढला. 

पुढे आम्ही वार्षिक युद्धसरावासाठी राजस्थानात जोधपूर, बाडमेर, जैसलमेर भागात गेलो. नवीन टेलीफोन केबल्स टाकणे आणि ठिकठिकाणी खांब रोवून त्या केबल्स सुरक्षित करण्याचे काम गेल्या-गेल्या सुरु झाले. जवानांकडून ते काम करून घेण्याची जबाबदारी गीतावर होती. दूरदूर पसरलेल्या रेडिओ तुकड्यांवर देखरेख करण्यासाठी मी दिवसभर जीपमधून हिंडत होतो. केबल्सचे काम कसे झाले आहे ते पाहायला मला रात्रीपर्यंत वेळच मिळाला नव्हता. रात्री जेवण झाल्यावर, टॉर्च घेऊन एकटाच माझ्या तंबूमधून बाहेर पडलो आणि केबल्सच्या इन्स्पेक्शनसाठी निघालो. 

अचानकच गीता तिच्या तंबूमधून बाहेर आली आणि म्हणाली, “सर, दिवसभर तुम्ही बाहेर-बाहेरच असल्याने केबल्सच्या कामाचा रिपोर्ट मी तुम्हाला देऊ शकले नाही. आता तुम्ही तिकडेच चाललेले दिसताय, तर मीही तुमच्यासोबत येते.”  

मी तिला सांगितले की जेवणानंतरचा फेरफटका आणि इन्स्पेक्शन अश्या दुहेरी हेतूने मी बाहेर पडलो होतो. तिने दिवसभर उभे राहून काम करून घेतले असल्याने, तिने विश्रांती घ्यावी. काम पाहून आल्यावर काही सूचना असल्यास त्या मी तिला दुसऱ्या दिवशी सकाळी देईन. 

“सर, काही चुका झाल्या असतील किंवा तुमच्या आणखी काही सूचना असतील तर त्या जागच्याजागी मला समजतील आणि उद्या काम करणे सोपे जाईल.” असे म्हणत गीताही माझ्यासोबत निघाली. 

मी केबल रूटचे निरीक्षण करण्यात गर्क होतो. गीताला वेळोवेळी काही सूचना देत असलो तरी तिच्याकडे माझे लक्षही जात नव्हते. आमच्या तंबूच्या जवळ आल्यावर माझी परवानगी घेऊन आणि सॅल्यूट करून ती तिच्या तंबूकडे निघाली. 

ती जात असताना प्रथमच माझ्या लक्षात आले की ती जरा लंगडल्यासारखी, पाय वेळावून टाकत होती. मी तिला त्याबद्दल विचारताच ती हसू लागली. मला काहीच कळेना. उत्तरादाखल तिने पाय वर करून मला तिचा बूट दाखवला. तिच्या बुटाच्या तळव्याचा अर्धा भाग टाचेकडून उकलला जाऊन लोंबत होता. 

“सर, आपण निघालो आणि थोड्याच वेळात एका ठिकाणी वाळूत माझा पाय रुतला. मी पाय जोराने खेचला आणि बुटाची ही अवस्था झाली. नशीब, मी आणखी एक बुटांची जोडी आणलीय, नाहीतर उद्या प्रॉब्लेमच आला असता.”

मला आश्चर्यच वाटले, “गीता, माझं लक्ष तर नव्हतंच, पण तू तरी मला तेंव्हाच सांगायचं होतंस.”   

“ठीक आहे सर, एवढा काही मोठा प्रॉब्लेम नव्हता.” असे म्हणून ती  हसत-हसतच निघून गेली. 

मी विचारात पडलो. तिच्या जागी कोणीही, अगदी मी जरी असतो तरी कदाचित, अचानक उद्भवलेली अडचण वरिष्ठांना दाखवून आपल्या तंबूकडे परत वळलो असतो. केबल रूटच्या इन्स्पेक्शनकरिता जाणे म्हणजे काही युद्धजन्य परिस्थिती नव्हती. पण, गीताला ते मान्य नसावे. एक स्त्री असल्याचा गैरफायदा घेऊन, आपण अवाजवी सवलत मागितल्याची शंका चुकूनही आपल्याबद्दल कोणाच्या मनात येऊ नये याकरिता ती अतिशय जागरूक होती.

गीतासारखेच कर्तव्यनिष्ठ आणि समर्पित वृत्तीचे पुरुष अधिकारीही वेळोवेळी माझ्या हाताखाली होते.  आजही त्यांची आठवण येते तेंव्हा मला त्या सर्वांचे गुणच आठवतात.

स्त्री-पुरुष समानता किंवा विषमता याबद्दलचे विचार माझ्या मनाला शिवतदेखील नाहीत.

लेखक : कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त)

मो  9422870294

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मी मतदार — भाग – १ ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? मनमंजुषेतून ?

☆ मी मतदार — भाग – १ ☆ श्री सुनील देशपांडे ☆

मी गोंधळलेला.

पूर्णपणे कनफ्यूज्ड.

मी शिकलेला किंवा

न शिकलेला.

विचार करणारा किंवा

न करणारा.

कसाही असलो, तरी माझ्या हातात काय आहे?

एक तर जे लोक निवडणुकीला उभे आहेत म्हणजे उमेदवार. त्यापैकीच एकाला मत द्यायचा अधिकार आहे किंवा सगळ्यांना नाकारण्याचा अधिकार अलीकडे मिळाला आहे.

परंतु त्याने साध्य काय होणार आहे? वरील सर्व योग्य वाटत नाहीत असे म्हणून मी नोटाला मत दिले तर त्यातून साध्य काय होते ? शेवटी निवडून येणार तो त्यापैकीच कुणीतरी एक. अगदी नोटाला जास्त लोकांनी मते दिली तरी त्या उमेदवारांच्या यादी पैकी कोणी तरी निवडून येणारच.

व्यवस्था अशी हवी की नोटाला सर्वात जास्त मते मिळाली तर जे उमेदवार उभे आहेत ते सर्व उमेदवार पुढील सहा वर्षासाठी कोणतीही निवडणूक लढवण्यासाठी अपात्र ठरतील.

असे झाल्यास स्वतःचे राजकीय करियर सांभाळण्यासाठी उमेदवारांना काळजी घ्यावीच लागेल. कुणी उठाव आणि नॉमिनेशन फॉर्म भरावा असे ऐरे गैरे लोक उभे राहणार नाहीत.

अशी सुधारणा कायद्यात होऊ शकेल काय ? खूप फरक पडेल असे वाटते.

© श्री सुनील देशपांडे

नाशिक मो – 9657709640 ईमेल  : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “असंही घडतं…?” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

??

☆ “असंही घडतं…?” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

वीस वर्षांपूर्वीची गोष्ट.

तेव्हा आम्ही सांताक्रुजला राहत होतो. चर्चगेटला जायचं असेल तर अकरा वाजता च्या लोकलने जात असू. ती अंधेरी वरून सुटत असल्याने तिला (त्याकाळी) फार गर्दी नसे.

त्या दिवशी मी व माझी मैत्रिण निघालो. गाडीत उजव्या बाकाजवळची सीट  मिळाली.

समोर एक बाई होती .तिने गुजराती पद्धतीने साडी नेसली होती आणि घुंगट अगदी खालीपर्यंत घेतलेला होता. तिचा चेहरा दिसतच नव्हता. शेजारी सुमारे पाच व तीन वर्षाच्या दोन मुली होत्या. त्यांच्या अंगावर स्वस्तातले पण नवीन फ्रॉक होते. दोन्ही मुलींच्या हातात  कॅडबरी होती. शेजारी प्लास्टिकच्या पिशवीत बिस्किट होती.

 गाडी सुटली आणि त्या बाईने दोन्ही मुलींना जवळ घेतले. त्यांचे पापे घेतले. मुलींना कुरवाळले…..

आणि जोरजोरात रडायला लागली.  अगदी तारस्वरात ती  रडत होती.

 ” झालं का परत सुरु …गप्प बैस.. काय झालं ग इतकं रडायला…. “

एक बाई तिला रागवायला लागली. आम्हाला काही कळेना..

“अहो सारखी रडते आहे . काय झालय काही सांगत पण नाहीये.  नुसती गळे काढून रडतीय “

 

सगळ्या नुसत्या  तर्क करायला लागल्या..

“कोणी घरी वारलं असेल..”

“नवरा मारत असेल …”

“भांडण झाल असेल…”

” नवऱ्याने सोडलं का काय….”

प्रत्येक जण कारण हुडकत  होतो. खार स्टेशन येईपर्यंत तिचं  रडणं चालूच होतं ….

 

मुलींना प्रथमच इतकी मोठी कॅडबरी मिळालेली असावी. त्या मजेत खात होत्या .

गाडी बांद्राकडे निघाली .थोडावेळ ती गप्प होती. आता परत रडणं सुरू झालं ……

मुलींना सारखी मिठीत घेत  होती. जवळ घेत होती….  कोणी किती रागवलं तरी ती रडायची थांबतच नव्हती. सांगून सांगून बायका दमल्या …तरी तिचं रडणं सुरूच होतं.

….  बांद्रा गेलं तशी ती गप्प झाली शांत झाली .

 

प्रत्येक जण आपापल्या नादात… काही वेळानंतर आम्ही पण दोघी तिला विसरून गप्पा मारायला लागलो.

आम्ही नंतर तिच्याकडे पाहिलंही नाही….. माहीम येईपर्यंत तिचा आवाज बंद होता.

माहीम आले.. उतरणाऱ्या  बायका उतरल्या चढणाऱ्या चढल्या…

मध्ये चार-पाच सेकंद शांत होते……..

… आणि अचानक ती बाई उठली..  प्लॅटफॉर्मवर उतरली. आणि सरळ पळत पळत निघूनच गेली….

 

त्याच क्षणी लोकल पण सुरू झाली….. क्षणभर काय झालं आम्हाला कळलच नाही..

“बाई पळाली … बाई पळाली “

एकच गडबड झाली…

 

“पोलिसांना फोन करा”

“दादरला गाडी गेली की बघू “

“साखळी ओढायची का “

“अशी कशी गेली”

… एकच आरडा ओरडा गोंधळ  सुरू होता….

 

तेवढ्यात कोपऱ्यातून एक आवाज आला …

” ती बाई काळी का गोरी कोणी बघितलेली नाही आपण तिला ओळखणार ही नाही..”

.. अरे बापरे खरंच की ..

शांतपणे ती बाई म्हणाली ….. 

” पोरींना टाकून ती बाई पळून गेली आहे … ..आणि मध्ये आपल्याला काही करता येणार नाही  गाडी चर्चगेटला गेल्यावर बघू “

 

खरचं की पुढच्या प्रत्येक स्टेशनवर गाडी जेमतेम दोन मिनिटं थांबणार तेवढ्यात काय करणार?

सगळ्यांना ते पटले…. प्रचंड भीती कणव…. दोन्ही पोरी तर रडायला लागल्या…

विचारलं ” कुठे राहता? “

“तिकडे लांब “….  एवढेच सांगत होत्या. काय करावं कुणालाच कळेना.

दादर आलं गेलं .

 

मुलींना कोणीतरी सांगितलं ..

“थोड्या वेळाने आई येणार आहे हं…”  त्यामुळे मुली गप्प बसल्या.

 धाकटीला आता झोप यायला लागली होती .ती मोठी च्या मांडीवर झोपली . मोठी रडून रडून शांत झाली होती. बहिणीच्या अंगावर हात टाकून बसली होती .

… विलक्षण करूण असं दृश्य होतं. अक्षरशः आमच्या सगळ्यांच्या डोळ्यांना धारा लागल्या होत्या .

 

“अशी कशी ही आई …” एवढच म्हणत होतो..

स्टेशन येत होती जात होती..

एक बाई म्हणाली….. 

” मी वकील आहे. मुलींना मी पोलिसांच्या ताब्यात देईन. माझ्याबरोबर तुमच्यापैकी कोणीतरी चला.”

 

“पोलीस ”  ….म्हटल्यावर आधी सगळ्यांचे चेहरे घाबरले. नंतर आम्ही सगळ्याच तयार झालो. चर्चगेट जवळ आलं तसं त्या छोटीला उठवलं .दोघींनी त्यांचे हात धरले.

त्या सारख्या म्हणत होत्या … ” मला आई पाहिजे..  मला आईकडे जायचंय .. आईकडे नेणार ना…”

“हो हो “….असं सांगितलं … त्या दोघींना खाली उतरवलं.

 

पोलिसांशी त्या वकिलीण  बाई बोलत होत्या.  मुलींना बाकावर बसवलं होतं…  इतरही आम्ही बऱ्याच जणी होतो…  मुलींना वाटत होतं  .. ‘ आई येणार आहे…  बिचार्‍या ….आईची वाट पहात  होत्या…

“आई कधी येणार ? आई कुठे आहे ?” असं सारखं विचारत होत्या. कितीतरी वेळ आम्ही तिथे होतो

 

आता या मुलींचं काय होणार… या विचाराची सुद्धा भीती वाटत होती. डोळे अक्षरशः  आपोआप वाहत होते… आम्ही मूकपणे  उभ्या होतो .

या मुलींना परत आई कधीही भेटणार नव्हती…. याचे आम्हाला प्रचंड दु:ख वाटत होते.

 

काही वेळानंतर दोन महिला पोलीस आल्या आणि मुलींना घेऊन निघाल्या.

त्या  दोघी लांब  जाईपर्यंत आम्ही बघत होतो …… 

 

या मुलींचे भवितव्य  काय असेल..

मुलींचा काय दोष…

 मुली म्हणून सोडून दिल्या का…

मुलं झाली असती तर सांभाळली असती का ?

मग मुलींना का टाकलं?

… अनेक अनुत्तरित प्रश्न  मनात उमटत होते….

 

या घटनेला इतकी वर्ष झाली तरी त्या मुली आठवल्या की माझे डोळे अजूनही भरून येतात.

आज कुठे असतील त्या मुली….. 

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य –मनमंजुषेतून ☆ “डी. लिट. … आणि… डिलीट…” ” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

श्री कौस्तुभ परांजपे

??

☆ “डी. लिट. … आणि… डिलीट…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे

काही शब्दांच्या भोवती एक वेगळंच वलय असतं. आपल्या बाबतीत तो शब्द  नुसता ऐकल्यावर त्याचा अर्थ नीट समजून न घेता आपण आनंद व्यक्त करायला सुरुवात करतो. अगदी ते होणं शक्य नसलं तरी…… असाच गोंधळ झाला होता तो  शब्दाचा. आणि घेतलेल्या अर्थाचा.

मला एक फोन आला. त्या व्यक्तीने मुद्द्याला हात घालत सरळ बोलायला सुरुवात केली…… (सरळ मुद्याला हात घातल्याने तो कोणत्या गावाचा असावा हे समजलं असेल.)

मी…….. अमुक अमुक……. आम्ही विचारपूर्वक तुमचे नांव आमच्या डिलीट च्या लिस्ट मध्ये घेतले आहे. तुम्हाला पुर्व कल्पना असावी म्हणून फोन करतोय. आपलं काही म्हणणं असेल तर विचार करून अर्ध्या तासात सांगा…..‌

        माझ्याबद्दल घेतलेल्या निर्णयाला विचार करायला मलाच वेळ द्यायचा….. हिच गोष्ट माझ्यासाठी मोठी होती. बाकी सगळे निर्णय मला मान्य असायलाच पाहिजेत हे गृहीत धरून सांगितले जातात……

अर्धा तास…… अरे वेळ कुणाला आहे थांबायला….. तरी देखील मी विचार करतोय, असं भासावं म्हणून, कळवतो असं सांगितलं……..

आता डिलीट च्या लिस्ट मध्ये नांव. मी काय विचार करणार….. खरं मी विचार करण्यापेक्षा त्यांनी केलेल्या विचारावरच मला विचार करायची वेळ आली होती…..

आता काय?……. अर्ध्यातासाने ही बातमी सगळीकडे पसरणार…… कौस्तुभच्या नावापुढे डि.लिट……अर्थात पसरवणार मीच…….

मी त्यासाठी तयारी सुरू केली. कालच दाढी केली होती तरीही आज परत केली. एक चांगला फोटो असावा (मागीतला तर द्यायला. हल्ली मला फोटो कोणी मागत नाही, मागीतला तर जूना नाही का? असं विचारतात. वर तो जरा बरा असेल असं सांगतात. आजकाल फोटो काढायला सांगणारे डाॅक्टरच असतात. आणि ते चेहऱ्याचा काढायला सांगत नाहीत.) म्हणून झब्बा पायजमा घालून घरातच मोबाईल वर दोन चार चांगले फोटो काढायला म्हणून तयारी केली. बायकोला देखील तयार व्हायला सांगितलं. 

फोन आल्यावर काय झालं आहे तिला कळेना….. माझी धावपळ पाहून तिचाच चेहरा फोटो काढण्यासारखा झाला होता. पण फोटो काढायला तयार हो म्हटल्यावर ती सुद्धा कारण न विचारता (नेहमीप्रमाणे मनापासून) तयार झाली. तेवढ्यात मिळेल त्या फुलांचा गजरा पण करून झाला.

इथे नको, तिथे, असं म्हणत घरातल्या सगळ्या भिंतीपुढे उभं राहून झालं. त्यातल्या त्यात बऱ्यापैकी रंग असणाऱ्या भिंतीपुढे, शेजारच्यांना हाताशी धरत फोटो काढले. आमचे फोटो काढायचे म्हणून त्यांना हाताशी धरलं…… नाहीतर……

त्यांनाही फोटो काढायची संधी मिळाल्याने मागे, पुढे, थोड जवळ, खांदा वर, नजर समोर, मान थोडी तिरपी अशा सुचना देत, सगळे दिवे लाऊन, मोबाईल एकदा आडवा, एकदा उभा धरून, एकदाचे वैयक्तिक आणि दोघांचे फोटो काढले. बघू बघू म्हणत आम्ही देखील ते दोन चार फोटो, पाच सहा वेळा पाहिले.

माझं नांव (कोणीतरी) डिलीट च्या लिस्ट मध्ये घेतलं आहे. असं मी बायकोला सांगता सांगता ते व्हाॅटस्ॲप वर पाठवलं सुध्दा…..

अय्या…… काय…… म्हणत ती जवळपास किंकाळलीच…… आता आम्हाला आमच्या अशा किंकाळीची सवय झाली आहे. प्रसंगानुसार आम्ही त्याचा अर्थ आमच्या सोयीने लाऊन घेतो.

आणि बातमी पसरली ….. मग काय?…. थोड्याच वेळात दोघांच्याही मोबाईलवर उजव्या, डाव्यांचे अंगठे, (हो दोघांचे उजव्या आणि डाव्या विचारवंतांचे) अभिनंदन संदेश, हसऱ्या चेहऱ्यापासून आश्चर्य वाटणाऱ्या चेहऱ्यांचे ईमोजी, अरे व्वा…..  पासून कसं शक्य आहे?….. अशी  वास्तववादी विचारणा, हे कधीच व्हायला पाहिजे होतं…… असा काहींचा दाखला…… असं सगळं व्हाॅटस्ॲप वर भराभर जमा झालं.

काही जणांनी मला फोन केले तर काही जणांना मी फोन केले…… मी काही करत नव्हतो तरी सुद्धा बायकोच्या फोनवरून मलाच फोन करून काही वेळ दोघांचा फोन व्यस्त ठेवला. तर मी कामात नसतांना सुध्दा कामात आहे असं भासवण्यासाठी बायकोला माझे आलेले फोन उचलायला सांगितलं. काहींना ते खरं वाटलं. तर मी कामात आहे असं बायकोने म्हटल्यावर कसं शक्य आहे?‌….. अशी शंका देखील काहींनी उघड उघड घेतली.

बरं पण असं मी काय मोठ्ठं काम केलं आहे की त्या कामाची दखल घेत माझ्या नावाचा डी.लिट साठी विचार केला. आणि असे कोण आहेत हे…..

कारण यांच्या यादीत राहू देत. पण गल्लीतल्या कार्यक्रमात सुध्दा माझं नांव कधीच आणि कोणत्याच यादीत नसतं. अगदी पत्रिकेतसुध्दा (प्रोटोकॉल) म्हणून काही ठिकाणी येतं……आणि यांनी अगदी डि.लिट साठी म्हणजे……. 

शेवटी मी न राहवून त्या व्यक्तीला फोन करून विचारावं म्हणून फोन लावला……. ती व्यक्ती म्हणाली “वाचाल तर वाचाल” हे वाक्य ऐकून माहिती आहे. आणि त्यात खूप चांगला अर्थ आहे. पण तुम्ही लिहिलेलं का वाचावं हेच समजत नाही. उलट ज्यांनी वाचलं नाही ते एका मनस्तापातून वाचले आहेत.

त्यामुळे आमच्या गृपमधून तुम्हाला वगळण्यात का येऊ नये? या अर्थाने आम्ही तुमचं नांव डिलीट च्या लिस्ट मध्ये घेतलं आहे. यावर काही म्हणायचे आहे का यासाठी फोन केला होता……. बोला. काही सांगायचं  आहे का तुम्हाला……

मी काय सांगणार……. मी पाठवलेले सगळे मेसेज आता मीच डिलीट करत बसलोय……..

आणि हो तो गृप पण मी डिलीट केला आहे……..

मीच मला विचारतोय…. हे कसं शक्य आहे…….. हे कधीच व्हायला हवं होतं…… डिलीट……..

©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “ऐकावं ते नवलच…” ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ “ऐकावं ते नवलच…” ☆ सौ राधिका भांडारकर 

खूप दिवसांपूर्वी वृत्तपत्रात एक बातमी वाचनात आली होती. मथळा असा होता..

एका तरुण दांपत्याची आत्महत्या सविस्तर बातमीत  लिहिले होते,

“हे दांपत्य तरुण आणि संगणक क्षेत्रात उच्च शिक्षित होते. दोघंही नामांकित कंपनीत उच्च पदाधिकारी होते. वर्षाचे भरभक्कम आर्थिक पॅकेज होते. मुंबईसारख्या शहरात उच्चस्थांच्या वस्तीत त्यांचा अद्ययावत, सुसज्ज असा ऐसपैस फ्लॅट होता. दोघांच्याही ब्रँडेड महागड्या गाड्या होत्या. ”

पोलीस तपास चालू आहे. आत्महत्येपूर्वी दोघांचीही सही असलेली त्यांनी लिहिलेली एक चिठ्ठी पोलिसांना सापडली. त्यात लिहिले होते,

“आमच्या आत्महत्येस फक्त आम्हीच जबाबदार आहोत. अल्पवयातच आम्ही जीवनात जे मिळवायचं ते सारं मिळवलं. आता पुढे काय हा प्रश्न आम्हाला सतत सतावायचा आणि या प्रश्नानेच आम्हाला खूप नैराश्य आले. असे वाटू लागले की जगण्यासाठी आता काही लक्ष्यच उरले नाही. मुले— बाळे —संसार या आमच्या जगण्याच्या संकल्पना होऊच शकत नाही. म्हणून आम्ही इथेच थांबायचं ठरवलं. जीवनच संपवून टाकायचं ठरवलं. या विचारापाशी आमचे अत्यंत आनंदाने एकमत झाले. म्हणून आमच्या आत्महत्येस कुणालाही जबाबदार धरू नये. जगाचा निरोप घेताना आम्ही खूप आनंदात आहोत. ”

ही बातमी वाचून आजच्या तरुण पिढी विषयी, त्यांच्या मानसिकतेविषयी सखोलपणे विचार करायला लागण्यापूर्वी माझ्या मनात इतकेच आले, ” खरंच ऐकावे ते नवलच. ”

सुदर्शन नावाचा माझा एक जुनियर मित्र अनेक वर्षे मस्कतला होता. त्या दिवशी अचानक आमची एका कार्यक्रमात भेट झाली. मी त्याला विचारले, ” किती दिवस आहेस भारतात?”

तो म्हणाला, ” अगं मी आता भारतात परत आलोय. मी निवृत्त झालोय्. ”

“निवृत्त? तुझं निवृत्तीचं वय तरी झालं का?”

“नसेल. पण आता मला काम करायचं नाही. मला माझे साहित्यिक आणि इतर छंद जपायचे आहेत. ”

तशी हरकत काहीच नव्हती पण तरीही मी थोडी संभ्रमित झाले. मग तोच सांगू लागला,

“कसं असतं ना? मी तेव्हा कॉलेजमध्ये होतो आणि एका घड्याळाच्या दुकानात मी एक सुंदर घड्याळ पाहिले होते. खूप महागडे आणि त्यावेळी मला ते विकत घेणे परवडण्यासारखे नव्हतेच. पण मी ठरवले, आयुष्यात कधीतरी याच ब्रँडचं हे महागडे घड्याळ घ्यायचं. पैसे मिळवण्यासाठी मी दुबई, मस्कत येथे नोकऱ्या केल्या. बायको आणि मुले भारतातच होती. बायकोला बँकेत चांगला जॉब होता. आजही आहे. मी खूप पैसा कमावला आणि एक दिवस मी माझे घड्याळ घेण्याचे स्वप्नही पूर्ण केले. मी खूपच आनंदात होतो. स्वतःला यशस्वी समजत होतो आणि नंतर एकदमच माझ्या जीवनाला कलाटणी मिळाली. एका बिझ्नेस कॉन्फरन्स मध्ये एका परदेशी  व्यक्तीशी माझा छान परिचय झाला आणि गंमत म्हणजे त्याच्या मनगटावरच्या घड्याळाने मी फारच प्रभावित झालो. मी त्याला सहज किंमत विचारली आणि ती ऐकून मी पार उडालो. माझ्या स्वप्नातल्या घड्याळापेक्षा पाचपट ते महाग होते आणि तेव्हांच जाणीव झाली याला काहीही अर्थ नाही. या पैशाच्या पाठी धावण्यात आपलं आयुष्य वाया जात आहे. ही प्रलोभनं न संपणारी आहेत. त्याच दिवशी मी राजीनामा दिला आणि भारतात परतलो. आता फक्त स्वतःचे छंद जोपासायचे. ” असे सांगत त्याने सहज माझ्या हातावर टाळी दिली. माझा संभ्रम वाढलाच होता. खरं म्हणजे मला माहित होतं, हा माझा मित्र सुंदर कविता लिहितो, तो अजिबात कलंदर वृत्तीचा माणूस नाही, जबाबदार कुटुंब वत्सल आहे.. ”

तरीही?  असो! ऐकावे ते नवलच.

माझी मुलगी अमेरिकेहून फोनवर बोलत होती. बोलता बोलता तिने मला सांगितले, ” मम्मी! अगं कृष्णाचे आणि शिवानी चे ब्रेकअप झाले. ”

“काय सांगतेस काय? किती छान दांपत्य होते ते! सदैव एकमेकांच्या प्रेमात असायचे. ”

माझ्या अमेरिकेच्या वास्तव्यात मी त्यांना अनेक वेळा भेटले होते. मला फार आवडायचे ते दोघे. ”

“अग! पण असं झालं काय?”

“फारसे डिटेल्स मला माहित नाहीत पण कुठल्यातरी एका क्षणी त्यांना वाटायला लागले की ती दोघं दोन भिन्न व्यक्ती आहेत आणि यापुढे एकत्र राहणं शक्य नाही. दोघांनी स्वतंत्रपणे जगण्याचा निर्णय घेतला आहे. They have just moved on. ”

मला इतकंच वाटत होतं की हे काही माझ्या संस्कृतीच्या पठडीतलं नक्कीच नाही.

पण यापुढे मुलीने आणखी एक धक्का दिला.

“आज त्यांच्या ब्रेकप पार्टीला आम्हाला जायचं आहे. ”

ब्रेकअप ही काय साजरी करण्याची बाब आहे का? मी पार चक्रावून गेले होते.

माझ्या अगदी जवळच्या मैत्रिणीच्या पतीचे नुकतेच निधन झाले होते. ज्या दिवशी ही घटना घडली तेव्हा मला जायला जमलं नव्हतं म्हणून मी काही दिवसानंतर तिला भेटायला गेले. माझं मन खूप जड झालं होतं. कशी असेल माझी मैत्रीण? एकाकी पडली असेल. इतक्या वर्षांचा त्यांचा संसार! काय बोलायचं तिच्याशी? कसं सांत्वन करायचं तिचं?

मी तिच्याकडे गेले तेव्हा ती एकटीच घरात होती. तिनेच दार उघडलं.

“ये बैस. ” म्हणाली.

खूप सावरलेली वाटली. गप्पांच्या दरम्यान ती म्हणाली,

“अगं! दिनेश नेहमी म्हणायचा ‘ मला ना असा झोपेतच मृत्यू यावा. यातना, वेदना आजारपण काहीही नको. सकाळ व्हावी, तू चहासाठी मला उठवायला यावंस आणि मी उठत नाही म्हणून मला हलवावस आणि तेव्हाच तुला कळावं की मी आता हे जग सोडून गेलो आहे. ’ आणि तुला सांगते, अगदी तसंच घडलं. दिनूला जसा मृत्यू यावा वाटत होते तसाच त्याचा मृत्यू आला. किती भाग्यवान ना तो! त्याच्या जाण्याने माझ्या आयुष्यात नक्कीच पोकळी निर्माण झाली आहे पण दिनेशच्या मनासारखे झाले म्हणून मला समाधानही  वाटते. ” जीवनात कुणी कसा विचार करावा हा शेवटी ज्याचा त्याचा प्रश्न नाही का?

आणि आता आणखी एक मजेदार किस्सा सांगते. तत्पूर्वी एकच सांगते की हा किस्सा वाचल्यानंतर केंद्रस्थानी असलेल्या त्या व्यक्तीविषयी आपण मुळीच गैरसमज करून घेणार नाही.

तेव्हा मी शाळेत होते. असेन आठवी नववीत. त्यावेळी काळ— काम —वेगाच्या गणितांनी मला अगदी बेजार केले होते. ते हौद, त्या तोट्या, ते पाणी नाहीतर भिंतीचे बांधकाम, कामगार, दिवस यांची गणितं मांडताना माझी दमछाक व्हायची. माझे वडीलच मला गणित शिकवायचे. खूप सुंदर पद्धतीने, सुलभ करून शिकवायचे. छान आकृत्या काढून समजावायचे.

एक दिवस असेच एक कठीण गणित मी महाप्रयत्नाने सोडवले. अगदी बरोबर उत्तरापर्यंत पोहोचले. तरीही वडील झटकन म्हणाले, ” चूक. शून्य गुण. मांडणी विस्कळीत..”

मला इतका राग आला त्यांचा! इतका वेळ झटापट करून मी गणिताचं बरोबर उत्तर मिळवलं आणि वडील म्हणतात, “चूक?” त्या क्षणी माझे भानच सुटले जणू! तीव्र क्रोधाचे भूत माझ्या मानगुटीवर बसले जणूं! आणि त्या तिरीमीरीत  मी वडिलांच्या गालावर जोरदार थप्पडच मारली.

मंडळी! या क्षणी तुमच्या मनातला माझ्याविषयीचा उरला सुरला आदर पार संपुष्टात आला आहे हे मला जाणवतेय्. पण थांबा! नंतरचे ऐका. दुसऱ्याच क्षणी माझे मन अपार गोंधळले. हे काय केले मी?

पण वडील शांत होते. त्यांचे टपोरे, पाणीदार, तेजस्वी, मोठे डोळे माझ्यावर त्यांनी रोखले. मी पुटपुटत होते. “पप्पा! मी चुकले हो! मी पुन्हा नाही अशी वागणार. ”

“ थांब बाबी. ”

वडील म्हणत होते, ” तुझ्या रागाच्या निचऱ्यासाठी माझा गाल हे तुझ्यासाठी सहज उपलब्ध असलेलं एक माध्यम होतं फक्त. तू माझी अत्यंत लाडकी, चांगली, आणि हुशार मुलगी आहेस. या क्षणी मला तुझा अभिमान वाटतो आणि विश्वासही वाटतो. तुझ्या आयुष्यात तू कधीही तुझ्यावर अन्याय झाला तर सहन करणार नाहीस. बेटा! शुभास्ते पंथान:सन्तु।।”

आजही या प्रसंगाकडे मागे वळून बघताना माझे मन अनेक भावनांनी उचंबळून येते. मी कुठलंही समर्थन देऊच शकत नाही. आणि तुम्हालाही हे नवलाचं वाटलं तर त्यात काहीच नवल नाही.

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “हिंदोळ्यावर…” ☆ सौ. रेणुका धनंजय मार्डीकर ☆

सौ. रेणुका धनंजय मार्डीकर

परिचय

शिक्षण: एम ए मराठी-

व्यवसाय: मैत्री गंधर्व फॅमिली रेस्टॉरंट, उमरगा-पार्टनर आणि गृहिणी. कॉलेज जीवनापासून लेखनाची आवड. कॉलेजमध्ये विद्यार्थी संसदेत सहभाग LR (लेडीज रिप्रेझेंटिटीव) पदाची मानकरी. 

लेखन–

  • मुरुड येथील साप्ताहिक गणतंत्र मध्ये पहिला लेख “एक शाम मस्तानी मदहोश किये जाय”. प्रकाशित. औसा येथील दर्पण मासिकातून कविता प्रकाशित… लातूर येथील “ब्रह्मसमर्पण”, मासिकातून 36 लेख प्रकाशित. फुलोराच्या पंधराव्या काव्य संमेलनात “फुलोरा रत्न” पुरस्काराने सन्मानित.
  • फुलोरा साहित्य समूहाच्या सतराव्या काव्य संमेलनात विशेष साहित्य सेवा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.  शुभंकरोती साहित्य समुहाकडून.. नवदुर्गा पुरस्काराने सन्मानित.
  • शब्दवेधी बाणाक्षरी समूहाकडून मला साहित्य रागिणी पुरस्कार आणि काव्यरंग पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
  • “ काव्यरेणू “ हा पहिला काव्यसंग्रह १ फेब्रुवारी २०२४ धुळे येथे झालेल्या राज्यस्तरीय काव्य संमेलनात प्रकाशित झाला.
  • धुळे येथील काव्य संमेलनात सांजवात कला साहित्य पुरस्काराने सन्मानित
  • शुभंकरोती साहित्य परिवारातर्फे महिला दिनी अष्टभुजा पुरस्काराने सन्मानित

सांजवात हा रांगोळी आणि चारोळी संग्रह प्रकाशनाच्या वाटेवर.

राहणार औसा.

? मनमंजुषेतून ?

☆ हिंदोळ्यावर…सौ. रेणुका धनंजय मार्डीकर 

उंच झोका झाडावर

पाळण्याची सय आली

झोपाळा ओसरीवर

मंद मंद झोका घाली

*

हिंदोळ्यावर सुखदुःखाची

स्वप्ने सारी पाहिली

गतकाळाची आठव पूंजी

झोपाळ्यावर राहिली

*

झोपाळा म्हटलं की ओसरीवर अगदी मधोमध माळवदाच्या कड्यांना बांधलेला झोपाळा आणि त्यावर घातलेली गादी आणि लोड आठवतात. बालपणापासून कितीतरी रूपात हा झोका आपल्याला भेटतो नाही का. अगदी जन्मल्याबरोबर विधिवत बाळाला पाळण्यात घातलं जात. त्याला नामकरण म्हणतात. आणि तिथून हा झोक्याचा प्रवास सुरू होतो. माझ्या घरी अजूनही माझा सागवानी लाकडी पाळणा आहे ज्या पाळण्यामध्ये मी तर खेळलेच, पण माझी मुलं देखील त्याच पाळण्यात खेळली. पाळण्यापासून सुरू झालेला हा प्रवास मग झोक्यापाशी येऊन थांबतो.

माझ्या बालपणी तर आमच्या सरकारी वाड्यामध्ये उंच माळवदाला झोका बांधलेला असायचा आम्ही भावंड नेहमी नंबर लावून झोका खेळायचो.

कोण सर्वात उंच झोका घेऊन चौकटीला पाय लावतो त्याची स्पर्धा लागायची आमची. किती सुंदर काळ होता ना तो बालपणीचा!

झोका आठवला की बालपणीची आठवण येते. आणि

“एक झोका चुके काळजाचा ठोका”अशी काहीशी अवस्था माझी होते त्याला कारणही तसेच आहे. माझ्या माहेरी चिंचेचे मोठं बन आहे. त्याला चिंच मळा म्हणतात. चिंचेची झाडं इतकी जुनी आहेत, उंच आहेत की नागपंचमी आल्यानंतर त्याच उंच झाडांना झोके बांधले जातात. माझ्या शेजारी एक ताई राहायची आणि ती मला झोका खेळायला घेऊन जाण्यासाठी घरी आली.मी तेंव्हा जेमतेम पाचवी सहावीच्या वर्गात असेन. माझ्या आईला सांगून मला ती ताई घेऊन जात होती तेव्हा आई म्हणाली, “तिला जास्त मोठ्या झोक्यावर नको हो बसवूस.”त्या ताईने मला तिच्या पायामध्ये बसवले आणि ती त्या उंच झोक्यावर उभी राहिली झोका उंच उंच गेला. चार-पाच जणांनी दिलेला झोका तो खूपच उंच गेला आणि जणू काही आम्ही आकाशात गेलो की काय असे वाटून मी घाबरून गेले उंच गेलेल्या झोक्यावरून एकदम सटकले, डोळे पांढरे झालेले. मी सटकलेली पाहून खालची सर्व मुलं-मुली मग मोठ्यांनी ओरडू लागली. सर्वजण खूप घाबरले होते पण प्रसंगावधान राखून त्या ताईने झोका थांबेपर्यंत मला तिच्या पायामध्ये आवळून धरले व एका पायावर ती झोक्यावर उभी राहिली व मला खाली पडू दिले नाही. पण तेव्हापासून मी कधीच तितक्या उंच झोक्यावर बसले नाही… अशी ही झोक्याची काळजाचा ठोका चुकवणारी आठवण.

ओसरीवरचा चौफाळा अजून आमच्या घरामध्ये आहे. माझ्या चुलत्यांनी त्याचा फक्त आता पलंगा सारखा वापर सुरू केला आहे. किती आठवणी असतील ना या चौफळ्याच्या. किती जणांची सुखदुःख ऐकली असतील याने. सुखदुःख ऐकवणारी सर्व माणसं काळाच्या पडद्याआड गेली. पण या चौफाळ्याच्या मनात मात्र यांचा शब्द न शब्द रुंजी घालत असणार. खरंच याला जर बोलता आलं असतं ना तर याने पूर्ण घराण्याच्या कथा ऐकवल्या असत्या अगदी पानाचा डबा घेऊन करकर सुपारी कात्रत गावकीचा कारभार पाहणारे घराचे कारभारी झोपाळ्यावर बसूनच तर बोलत असणार. दोन-तीन माणसं आरामशीर बसू शकतील इतका मोठा हा चौफाळा आहे. दुपारच्या वेळेला पुरुष मंडळी नसताना स्त्रियांनी देखील याचा आस्वाद घेतला असणार. कारण पूर्वीच्या काळी पुरुष माणसे घरात असताना, स्त्रिया कधी ओसरीवर येत नसत. पण ते  बाहेर गेल्यानंतर मात्र ह्या स्त्रिया चार सुखदुःखाच्या गोष्टी बोलण्यासाठी नक्की ओसरीवर आणि चौफळ्यावर बसत असणार. नुसतं कुठल्या हो गप्पा मारणार हातात वातीचा कापूस, संध्याकाळच्या स्वयंपाकासाठी भाजी नीट करणे, अशी सवडीची काम घेऊन मगच त्या गप्पा मारणार. कितीतरी स्त्रियांची हितगुजं, ऐकली असतील नाही का या झोपाळ्यांने. नाही नाही तो जणू त्यांचा सांगातीच झाला असेल.

घरात कोणी नसताना एखादं तरुण जोडपं देखील नक्कीच विसावलं असणार झोपाळ्यावर. ओसरीवरून अंगणातलं टिपूर चांदणं आणि थंड वाऱ्याची झुळूक घेतली असणार त्यांनी अंगावर. कधी घरातल्या आजी आजोबाही पत्ते खेळत बसले असणार. किंवा त्या काळात सोंगट्या देखील खेळायचे, झोपाळ्यावर बसून.घरातली छोटी मुलं देखील या झोपाळ्यावर दंगामस्ती करायची, आणि मग एखादं डोहाळे जेवण जर घरामध्ये असेल तर मात्र काय थाट वर्णावा या झोपाळ्याचा. त्याच्याकड्यांना छान छान फुलांच्या माळा वेली पाने लावून सुरेख सजवले जायचे. त्या रुबाबदार झोपाळ्यावर बसवून मग त्या पहिलटकरणीचे सर्व लाडकोड करत सोहळे साजरे व्हायचे. घरात माणसांची खूप गर्दी झाली तर एखादं माणूस झोपून जायचं या झोपाळ्यावरचं. कितीतरी जणांच्या परसामध्ये हा चौफाळा असायचा. हिरव्यागार झाडीमध्ये या चौफाळ्यावर बसून मंद मंद झोके घेत सर्वजण आनंद घ्यायची. कितीतरी उपयोग होता या झोपाळ्याचा. आणि भल्या मोठ्या ओसरीची शान होता हा झोपाळा.

काळानुरूप झोपाळ्याचे स्वरूप बदलले. पितळी कडया जाऊन त्या जागी लोखंडी कड्या आल्या. काही ठिकाणी जाड सोल लावूनही झोपाळा बांधला जातो. त्यातही आजकाल आधुनिकीकरण आले आहे. खुर्ची वजा झुला बाल्कनी मध्ये आजकाल आढळतो. शहरांमध्ये मोठमोठ्या उद्यानात झोपाळे असतात.

काळ बदलला तरीही कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये हा झोपाळा आपल्या आयुष्यात अजूनही त्याचे स्थान टिकवून आहे. म्हणून शेवटी झोपाळा, झुला, चौफाळा, झोळी, पाळणा, झोका या सर्व हिंदोळ्याच्या रूपांना उद्देशून मी म्हणेन-

बदललेल्या रूपातून

आजही झोपाळा दिसतो

हिंदोळा सुखाचा देतो

आणि गोड हसतो

 

हितगुज करतात 

त्याच्या सवे वारे

झुल्यावर झुलताना

सुखावती सारे

 

 © सौ.रेणुका धनंजय मार्डीकर

औसा.

मोबा. नं.  ८८५५९१७९१८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ रंगात रंग तो श्यामरंग… ☆ सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

? मनमंजुषेतून ?

☆ रंगात रंग तो श्यामरंग… ☆ सौ. मंजुषा सुनीत मुळे

तुला एक गोष्ट सांगू …..

अगदी मनाच्या गाभ्यात जपलेली …..

 

तू नकळत माझ्या आयुष्यात आलास … अगदी अलगदपणे ….

पण रिकाम्या हाताने नाही … येतांना ओंजळी भरभरून आणलेस ..

कितीतरी सुंदर मोहक रंग ….

…. प्रेमाचा गुलाबी रंग

…. प्रसन्नतेचा हिरवा रंग

….  पावित्र्याचा केशरी रंग

….  मन शांतवणारा आभाळाचा निळा रंग

….  आणि मन उल्हसित करणारा … नव्या आशा मनात जागवणारा …

उगवत्या सूर्यासारखा लाल पिवळा रंग ….

 

आणि बघता बघता मी ……

मी या सगळ्या रंगांमध्ये पूर्णपणे रंगून गेले  ..

हरखून गेले .. … स्वतःलाही विसरले  ….

…. आणि नकळत जणू मीही झाले राधा …. सगळं भान हरपून

कृष्णाच्या  श्यामरंगाने माखून गेलेली …. तृप्त झालेली राधा ….

स्वतःला आणि  साऱ्या सृष्टीलाही विसरून गेलेली …. कृष्णमय राधा..  …

 

आणि तू …..

तू झालास माझा कृष्ण ..

माझ्याकडे अतीव प्रेमाने … अनोख्या आपुलकीने बघत ..

स्नेहाचा रंग उधळतच राहिलेला … जगाची पर्वा न करणारा ….

फक्त आणि फक्त माझाच असल्यासारखा  जिवलग कृष्ण ……

 

पण तरीही ….

तरीही का कोण जाणे….  पण जाणवलं … मनापासून जाणवलं ..

….  तू नकळत पूर्णपणे अलिप्त ….

सगळीकडे सगळ्यात असूनही … कशातच नसलेला …

कशातच नसलेला …….. अगदी त्या श्यामरंगातही ……

सौ. मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print