मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “टीप…” ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

? मनमंजुषेतून ?

☆ “टीप…” ☆ श्री मंगेश मधुकर

वाढदिवसाच्या निमित्तानं सहकुटुंब हॉटेलमध्ये जेवायला गेलो. मुलांनी निवडलेलं हॉटेल खरचं चांगलं होतं. नुसताच दिखाव्यावर खर्च केला नव्हता तर जेवणाची क्वालिटी आणि चवसुद्धा उत्तम होती. फक्त वेटरची सर्विस म्हणजे निवांत कारभार.

भरपूर गप्पा आणि आवडत्या डिशेशवर यथेच्छ ताव मारल्यावर वेटर बिल आणि बडीशेप घेऊन आला. कार्ड पेमेंट केलं आणि तो क्षण आला…. “ थँक्यु सर ”म्हणून वेटर गेल्यावर बायको आणि मुलगी माझ्याकडं एकटक पाहत होत्या. मुलगा मोबाईलमध्ये हरवलेला.दोघींच्या बघण्यावरून लक्षात आलं की आता नेहमीच्या वादाला तोंड फुटणार आहे. भरपूर आवडीचं खाऊन सुद्धा पोटात खड्डा पडला. मनापासून वाटत होतं ‘टीप’ द्यावी. पण बायको आणि मुलीचा तीव्र विरोध. ‘ टू बी ऑर नॉट टू बी ‘अशी संभ्रम अवस्था. मी खिशातून पाकीट काढलं….. 

“अजिबात द्यायची नाही ” .. बायको 

“ मागच्या वेळी सांगून सुद्धा तुम्ही दिली होती. आज नाही म्हणजे नाही ” .. मुलगी 

“ बाबा,तुम्ही टीप द्या ” मोबाईल वरची नजर न हटवता मुलगा म्हणाला.

“ काय द्या ?आणि कशाला ??” .. बायको. 

“ बाबा,नाही हं ” .. मुलगी 

“ जेवणावर एवढा खर्च झाला ना मग आता क्षुल्लक गोष्टीसाठी वाद नको ” .. मी 

“ येस,बाबा यू आर राईट ” .. मुलगा 

“ ए,तु गप रे ” .. मुलगी खेकसली. 

“ पन्नास रुपायानं काय फरक पडणारयं ”

“ तेवढ्या पैशात एक लिटर दूध येतं ”

“ आपण जेवलो तेवढ्या पैशात महिनाभराचं दूध आलं असतं ” .. मी चिडलो. 

“ प्रश्न पैशाचा नाहीये ” .. बायको 

“ मग,प्रॉब्लेम काय ? ”

“ मेंटॅलिटी ”

“ कसली डोंबलाची मेंटॅलिटी,त्याचा इथं काय संबंध? ”

“ हॉटेलमध्ये आलो. ऑर्डर दिली, वेटरनं सर्व्ह केलं. जेवलो. बिल पे केलं.विषय संपला ”

“ अगं पण..”

“ वेटरनं त्याचं काम केलं. त्याचेच तर पैसे मिळतात.” 

“ बक्षिस म्हणून ‘टीप’ देतात. वेटरच्या अपेक्षा असतात. तशी पद्धत आहे.”

“ कोणी सांगितलं ? अशी पद्धत बिद्धत काही नाहीये. उगीच आपलं सगळे देतात म्हणून आपणही टीप द्यायची. त्याला काही लॉजिक नाहीये ” .. मुलगी उसळली.

“असं काही नाही. टीप न देता जाणं योग्य दिसत नाही ” .. मी 

“ हे मेंढरांच्या कळपासारखं झालं. एकदा सर्वात पुढे असलेली मेंढी चुकून खड्ड्यात पडली आणि उठून पुन्हा चालू लागली. मागच्या सर्व मेंढयानी खड्ड्यात उड्या मारल्या. ’टीप’ द्यायचं पण असंच काही आहे.” .. बायको

“ ते काही माहीत नाही. उगीच ईश्यू करू नका. आज वाढदिवस आहे तेव्हा..” .. मी 

“तेच तर आज चांगला दिवस आहे.असल्या गोष्टी बंद करा”मुलगी 

“ तुमच्यासारखे कर्णाचे अवतार आहेत म्हणून तर हे टीपचं फॅड सुरू झालंय. चला आता, एक रुपया सुद्धा ठेवायचा नाही.” 

इतरवेळी मायलेकीचं अजिबात पटत नाही.  पण इथं लगेच एकमत झालं. टीप न देण्याविषयी बायको आणि मुलीनं युती करून माझ्याविरुद्ध आघाडी उघडली.

“आजच्या दिवस देऊ दे नंतर कधीच देणार नाही.” … मी समेटाचा प्रयत्न केला. सगळे उभे राहिले परंतु टीप न देता बाहेर पडणं विचित्र वाटत होतं. हॉटेलमधले सगळे माझ्याकडेच बघताहेत असा भास व्हायला लागला. उगीचच गिल्ट आला. सर्विस देणारा वेटरनं एकदोनदा माझ्याकडं पाहिलं. पाय निघता निघेना. काहीतरी आयडिया करून टीप द्यावी असा विचार चालला होता, परंतु सोबतचे चार डोळे रोखून प्रत्येक हालचालीकडे पाहत असल्याने नाईलाज होता. पाकीट हातात धरून उभा असताना मनात  मात्र विचारांचे चक्रीवादळ  “ काय करावं? ‘टीप’ द्यावी की नाही. “ तुम्हाला काय वाटतं…… 

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ मी… माझा बाप… आणि माझी आई… !!!… भाग – 1 ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ मी… माझा बाप… आणि माझी आई… !!!… भाग – 1 ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

ही मला भेटली होती साधारण तीन वर्षांपुर्वी … !  वय साधारण ३५ ,  सोबत ५-६ वर्षांचा मुलगा…! एका धार्मिक स्थळाबाहेर मागून खायची. औषधं देता देता चांगली ओळख झाली. मला ती दादा म्हणायला लागली ! 

दरवेळी मला कोडं पडायचं… हा मुलगा कुणाचा ? जर तिचा असेल, तर याचे वडील कुठं आहेत ? याला वडील असतील, तर मग ही एकटीच कशी दिसते ? 

एके दिवशी मी विचारलंच… ! 

… लहानपणीच आईवडील वारले, जवळचं कुणी नाही… पूर्णतः निराधार. जगण्यासाठी भीक मागणं हे सोपं काम निवडलं. दिवसा भीक मागायची आणि रात्री कुठंतरी आडोसा शोधून झोपायचं, हा रोजचा दिनक्रम !

रानटी जनावरं फक्त जंगलातच नाही, तर समाजातही अनेक ठिकाणी सापडतात. मला तर वाटतं नरभक्षक जनावरं जंगलात आणि मादीभक्षक जनावरं समाजात राहतात! 

अशाच एका मादीभक्षक जनावराच्या तावडीत ती एका रात्री सापडली… आरडाओरडा केला पण तो ऐकायला कुणालाच वेळ नव्हता… ! प्रत्येकाला कुठंतरी पोचायचं होतं… ! 

या झटापटीत एक मूल हिच्या पदरात पडलं… ! एकटीची जगायची भ्रांत, त्यात अजून एकाची भर पडली. 

‘ठीक आहे, जगात आपलं असं कुणीच नव्हतं, आता आपलं म्हणावं, असं आपलं मूल तरी आपल्याबरोबर आहे, आधार होईल भविष्यात जगण्याचा ‘ या सकारात्मक   विचारानं तिनं आईपण जपलं… मुलाला जमेल तसं ती वाढवत गेली  ! 

आणि याचवेळी मला ती भेटली होती…. तीनेक वर्षांपूर्वी ! 

“काम का नाही करत गं ?” मी तिला तेव्हा विचारायचो. ती फक्त मान डोलवत गूढ हसायची. वेगवेगळे व्यवसाय मी तिला सुचवायचो… मदत करतो असं म्हणायचो… पण ती ऐकल्यासारखं करायची आणि पोराला हाताला धरुन दूर जायची ! उदास होऊन शुन्यात बघत रहायची ! 

बरोबर आहे, इतक्या मोठ्या विश्वासघाताची भेट मिळाल्यानंतर तिनं माझ्यावर तरी का विश्वास ठेवावा ? 

भरल्या पोटानं दिलेला सल्ला उपाशीपोटी पचत नाही हेच खरं ! गाण्यातले सूर हरवतात तेव्हा ते गाणं बेसुर होतं… आणि जगण्यातला नूर हरवला की ते जगणं भेसुर होतं…! असं सर्वच हरवलेलं ती…!

एकट्या राहणाऱ्या या तरुण मुलीला सांभाळुन घेणारा, मनासारखा कुणीतरी जोडीदार मिळाला, म्हणजे ती डिप्रेशनमधुन बाहेर येईल असं मला डाॕक्टर म्हणुन सारखं वाटायचं. 

डिप्रेशनच्या पेशंटला औषध न लगे… ! 

औषध ‘नल’ गे तीजला !

औषध फक्त त्या पेशंटचा हक्काचा ‘नल’ ! 

अत्याचार झालेल्या, भीक मागणाऱ्या मुलीला तिच्या मुलासह कोण स्विकारणार ? हा मोठा प्रश्न होता. तिला हा हक्काचा ‘नल’ कधी सापडणार…. ? कसा ?

दिवसांवर दिवस जात होते. अशात मला एक तरुण भेटला. चुणचुणीत आणि गोड बोलणारा. यानेही आयुष्यात खुप थपडा खाल्ल्या होत्या, ढोलासारख्या ! थपडा मारुनही ढोल नाद निर्माण करतो…. ! हा सुद्धा त्या ढोलासारखाच ! थपडा खाऊनही बोलणं आणि वागणं अतिशय नम्र आणि गोड, एक नाद निर्माण करणारं ! 

आपल्या शब्दांत नम्रता आणि गोडवा असेल तर  शब्दांना वजन प्राप्त होतं. शब्दांतली नम्रता आणि गोडवा हरवला की याच शब्दांचा स्वतःला भार होतो आणि दुसऱ्याला ओझं ! असो…

तर, यालाही मी काम करण्यासाठी विनवलं…! याला भीक मागायचीच नव्हती… कमीपणा वाटायचा याला भीक मागण्यात… व्यवसाय सुरु करण्याची जिद्द होती याच्यात, पण संधी मिळत नव्हती ! मी हात देतोय म्हटल्यावर, झट्दिशी त्याने तो पकडला. व्यवसाय सुरु केला… आणि बघता बघता छान चालायलाही लागला… ! 

अतिशय प्रामाणिक आणि मनमिळाऊ असलेला हा मुलगा मला आवडायचा. एकदा गंमतीने याला म्हटलं… “काय मालक ? आता लग्न करा की राव …!”

“करु की सर, तुम्ही बघा मुलगी… सांगाल त्या मुलीशी लग्न करतो…” तो म्हणाला होता. 

हसून हा विषय तिथं संपला खरा… पण ‘सांगाल त्या मुलीशी लग्न करतो…’ या त्याच्या वाक्यानं मला रात्र रात्र झोप यायची नाही…! 

एकदा मनाचा हिय्या करुन याला ‘ती’ ची सर्व परिस्थिती सांगितली. हात जोडून म्हणालो… “करशील का रे लग्न तिच्याशी ?”

क्षणभर विचार करत, माझ्या नजरेला नजर भिडवुन म्हणाला, “माझ्यासारख्या भीक मागणाऱ्याला तुम्ही हात देऊन बाहेर काढलंत सर, मी रोज विचार करायचो की या डाॕक्टरच्या उपकाराची परतफेड कशी करायची ? उभं असलेल्या माणसाला पाडायला फार ताकद लागत नाही, पडलेल्या माणसाला उठवायला जास्त ताकद लागते, हे मी तुमच्याकडनं शिकलो सर…. तुम्ही मला तेव्हा उठवलंत… आता पडलेल्या कुणालातरी उठवायची पाळी माझी आहे… तुम्ही जे माझ्यासाठी तेव्हा केलंत, आज ते मी पुन्हा करणार तुमच्यासाठी …!”

माझ्या डोळ्यात पाणी ठरेना ! 

तो तिच्याशी लग्नाला तयार झाला यापेक्षाही..  ‘आपण सावरल्यावर, दुसऱ्याला हात द्यायचा असतो ‘, हे तो शिकला यात मला जास्त आनंद होता…!

माझ्यापेक्षा लहान आहे तो… पण मला त्याचे पाय धरावेसे वाटले…!

पाय तरी कसं म्हणू ? चरण म्हणणंच जास्त योग्य ! 

भरकटतं ते पाऊल, घसरतात ते पाय… आणि दिशा दाखवतात ते चरण… ! 

अत्याचारीत मुलीला तिच्या मुलासह स्विकारण्याची तयारी आणि तिच्या मुलाला आपलं नाव देऊन त्यांच्या आयुष्याला दिशा देण्याचा विचार करणाऱ्या त्या तरुणाचे पाय मला जणु चरणच भासले… !

यानंतर दोघांची भेट घडवून आणली ! ‘दोघांनी एकमेकांना समजून घेऊन, पुर्ण विचाराअंती निर्णय घ्यावा. कोणताही निर्णय घेण्याचा समसमान अधिकार दोघांनाही आहे, कसलीच बळजबरी कुणी कुणावर करणार नाही’ या बोलीवर त्यांना बोलणं आणि भेटण्याची संधी दिली. 

— क्रमशः भाग पहिला 

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ अष्टमीच्या पावसाला… ☆ श्री सुहास सोहोनी ☆

श्री सुहास सोहोनी

? मनमंजुषेतून ?

☆ अष्टमीच्या पावसाला… ☆ श्री सुहास सोहोनी ☆

एक काळ असा होता की, धो धो कोसळणारा पाऊस अंगावर झेलत – रस्त्यात, शेतात, नदीच्या काठावर, नाही तर हिरव्यागार कुरणातून चालण्या-भटकण्याचा – मनसोक्त आनंद लुटत होतो.

ते दिवस तर आता संपले. आता तोच आनंद लुटत असतो, उघड्या पडवीत आरामखुर्चीत निवांत बसून – धो धो पाऊस, थोडीशी थंडी, भीमाण्णांचे मल्हाराचे सूर, कांद्याची भजी, आल्याचा चहा – या सगळ्यांचे कथ्थक नर्तन अवलोकून!

या पावसाच्या चालू हंगामामध्ये – पाऊस भजी चहा – असे अपूर्व त्रिवेणी योग तीन-चार वेळा जुळून आले आणि मानस तृप्त जहाले !!

आजही पाऊस पडतोच आहे. पण संतत धार नव्हे. एकदाच पडला. अगदी धो धो नसला, तरी बऱ्यापैकी सरी कोसळल्या. पण आज मला फक्त पाऊसच हवा आहे. बाकी काहीच नकोय्.  दर क्षणांला स्वत:ला आकाशातून झोकून देत पृथ्वीकडे झेपावणारे पाण्याचे लाखो थेंब – शुद्ध, सात्विक आणि पवित्र – मी नजरेने पीत आहे – किती तरी वेळ! आता मला त्यासोबत इतर कुठले अर्कही नकोयत आणि दर्पही नकोयत.

कारण आजचा पाऊस, हा अष्टमीचा पाऊस. अष्टमीचा पाऊस म्हणजे कृष्णाचा पाऊस! त्याच्या जन्मकाळी  पडला तोच हा पाऊस. वसुदेवाचा पाऊस, देवकीचा पाऊस, यशोदेचा  पाऊस – आणि माझा पाऊस !!

हा पाऊस माझ्यासाठी घडवून आणील दुर्मिळ दर्शन श्रीमुखाचे, अलभ्य श्रवण वेणूनादाचे, अलौकिक स्पर्श चरणकमळांचे आणि उन्मनी गंधवेड ‘ अवचिता परिमळूचे ‘ !!

जसे इच्छिले तसेच घडले

मनिचे हेतू पूर्ण जाहले

 

थेंबाथेंबातून जाहले

दर्शन श्रीहरिचे

धारांच्या नादातुन आले

गुंजन मुरलीचे

 

मोरपीस लेवून मस्तकी

प्रभुजी अवतरले

अष्टमीच्या धारांतून दैवी

इंद्रधनू प्रकटले

लेखक : सुहास सोहोनी. 

दि. ७-९-२०२३ – कृष्ण जन्माष्टमी

मो ९४०३०९८११०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ गणपत्ती बाप्पा मोरया …… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – डाॅ.भारती माटे ☆

डाॅ.भारती माटे

??

गणपत्ती बाप्पा मोरया… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – डाॅ.भारती माटे 

एका मित्राच्या बर्थडे पार्टी होती. एका छानशा बँक्वे हॉलमध्ये ही पार्टी ठेवली होती. मित्राचे बरेच ओळखीचे आणि परिचयाचे लोक तिथे आले होते. “हाय! हॅलो!!” वगैरे सगळं झालं. मलाही माझे कॉलेज मधले कॉमन मित्र भेटले. पार्टी रंगात येऊ लागली होती. मग जेवणाच्या आधी ‘ड्रिंक्स & डान्स’ चं आयोजन होतंच.

सगळ्यांचे हात ग्लासांनी भरले. डी.जे.चं सगळ्यांनी टाळ्या वाजवून स्वागत केलं. नाचायला पूर्ण तयार झालेली लोक, आता कुठलं गाणं हा डी.जे. लावेल आणि त्यावर कुठल्या स्टेप्सवर नाचायचं ह्यावर काही उत्साही मंडळी चर्चा करत होती… आणि गाणं सुरु झालं!

“गजानना श्री गणराया, आधी वंदू तुज मोरया… मंगलमूर्ती…” सगळे आलेले लोक अवाक होऊन एकमेकांकडे बघू लागले. बर्थडे पार्टी, हातात दारूचे ग्लास आणि कसलं हे गाणं ? गजानना गणराया ?” लोकांची कुजबुज जाणवण्याएवढी वाढली. शेवटी त्या उत्साहावर पाणी पडलेल्या एकाने विचारलं, “ऐ, हे काय, पार्टीत काय हे गाणं लावता ? कोई पार्टीवाला गाना लगाओ यार!” तसा माझा मित्र, ज्याचा वाढदिवस होता, हातात माईक घेऊन स्टेजवर चढला.

“मित्रांनो, माझी बर्थडे पार्टी आहे. आता पार्टी म्हंटली कि त्यात कुठचंतरी पार्टी सॉन्ग वाजेल अशीच तुमची अपेक्षा होती ना ? अर्थात असणारच! पण जसं एखाद्या पार्टीत हे ‘गजानना गणराया’ गाणं शोभत नाही ना, तसंच एखाद्या गणपतीच्या मांडवात देखील एखादं पार्टी साँग शोभत नाही. पण त्यावेळेस आपण आपला विरोध दर्शवतो का? नाही! ‘आपल्याला काय करायचंय?’ म्हणून सोडून देतो. पण हे चुकीचं आहे. गणेशोत्सव हा ‘उत्सव’ आहे आणि गणपती हा आपण देव मानतो. त्याला ‘Showpiece’ करून ठेवू नका. आत्ता ह्या पार्टीत जसा विरोध दाखवलात ना, तसाचं विरोध एखाद्या गणपतीच्या मांडवातसुद्धा दाखवा. D.J. फक्त पार्टीची शोभा वाढवतो, उत्सवाची नाही! हे लक्षात ठेवा. हातात दारूचे ग्लास, पार्टीत बरे वाटतात, गणपतीच्या मिरवणुकीत नाही. विरोध दर्शवा. आपण गप्प बसतो म्हणून हे खूळ बोकाळलंय. सगळीकडे दारू आणि डी.जे चालणार नाही हे कळूदे ना गणेशोत्सव मंडळांना. जिथे असला थिल्लरपणा चालत असेल अशा उत्सव मंडळांना वर्गणी, देणगी, जाहिरात देऊ नका. मग बघा परिवर्तन होतं कि नाही ते. आणि, सो सॉरी. मला ही गोष्ट खटकते. गणपती यायला आता फक्त 10-12 दिवस उरलेत आणि आज तुमच्यापर्यंत माझा विचार पोचावा अशी माझी इच्छा होती, म्हणून हे सगळं मीच घडवून आणलं. Now enjoy your Party, Friends!” म्हणत हा खाली उतरला.,टाळ्यांचा कडकडाट झाला!

मी मात्र नाचण्याऐवजी ड्रिंकचा आस्वाद घेणं prefer केलं. हा माझा मित्र माझ्या शेजारी येऊन उभा राहिला आणि खांद्यावर हात ठेवत म्हणाला, “लोकांना ना ज्या भाषेत समजतं, त्याच भाषेत समजवावं लागतं. कशी वाटली आयडिया ?” तसं मी हसत म्हटलं, “साल्या, डोक्याचा उपयोग अगदीच उशीवर ठेवण्याकरता करत नाहीस. ग्रेट! चियर्स!!”

कृपया हा मेसेज तुमच्या प्रत्येक ग्रुप वर शेयर करा जेणेकरून किमान ह्या गणपति उत्सवात देवाचे पावित्र्य जपले जाईल  शेवटी मला जे योग्य वाटले ते मी सांगितले शेवटी प्रत्येकाला निर्णय स्वातंत्र्य आहे गणपत्ती बाप्पा मोरया …… 

लेखक : अज्ञात

संग्रहिका : डॉ. भारती माटे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ स्वप्न फुले… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

??

☆ स्वप्न फुले… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

आज माझ्या स्वप्नात आलं आमचं घर, आमचं अंगण ! दारासमोर दिसला पारिजातकाचा सडा ! शुभ्र पांढऱ्या रंगाची ,केशरी देठाने सजलेली, नाजूक इवली इवली फुले सगळीकडे चांदण्यासारखी पसरली होती. नारळाच्या झाडाच्या साथीला होते प्राजक्ताचे झाड ! एरवी तसं रिकामंच दिसणारं ! पण पावसाची चाहूल लागली की बहरून येणारं ! डावीकडे होती इतर छान फुलांची झाडे ! एक मोठा कुंदाच्या झाडाचा पसारा बाजूला होता. काही वर्षे इतकी सुंदर कुंदाची पांढरी आणि मागून थोडीशी जांभळी झाक असलेली कुंदाची फुले येत होती .संध्याकाळी त्याच्या कळ्या टपोऱ्या फुगलेल्या दिसत. पण काही वेळा झाडाला दृष्ट लागते ना तसं झालं ! एवढं फुलणारं झाड..   त्याला फुलेच येईनाशी झाली ! राहिला तो मोठा झाडाचा पसारा !

बाजूलाच होता जुईचा वेल ! छोटी छोटी सुवासिक फुले ! वरच्या माडीपर्यंत वाढत गेलेला तो वेल पावसाचे दोन-चार महिने डोळ्याला आनंदित, सुगंधित करून जायचा ! त्याची इवली इवली फुले वेलीवरून घरंगळत खाली यायची आणि ती पहाताना मन मोहरून जायचे ! एक वर्ष तर अधिकाच्या महिन्यात रोज जुईचा गजरा देण्याचा नेम केला होता. सवाष्ण अगदी सुहास्य वदनाने ते वाण घेत असे. मोगऱ्याची दोन-चार झाडे उन्हाळ्यात आपल्या पांढऱ्या शुभ्र फुलांनी वातावरण आनंदित, प्रफुल्लित करून जायची ! देशी गुलाबाचं एक झाड असेच एखाद्या वर्षी बहरून जायचे ! जवळपास एखादा निशिगंधही असे. त्याचा एखादा तुरा मोरासारखा डोलत असे ! ब्रह्म कमळाचे खोड वर्षभर दिसे न दिसे, पण या पावसाच्या काळात ब्रह्मकमळाची पाच दहा फुले तरी मनाला आनंद देत असत ! तुळशी वृंदावनातील तुळस मनाला प्रसन्न करत असे. अधून मधून छोटी बटन शेवंती रुजवलेली असे तर दसऱ्याच्या दरम्यान मिळावीत म्हणून झेंडू वाढवलेला असे ! गौरीच्या दिवसात तेरडयाची पाने मिळावी म्हणून एखादं गौरीचे रोपही बागेत असे. जांभळी, गुलाबी गौरीची फुलं काही दिवसच  येत, पण बागेची शोभा वाढवत ! छोटीशी जागा पण किती तऱ्हेतऱ्हेची फुले देत असे !

मागच्या अंगणात माझ्या दिरांनी सुंदर गुलाबाची कलमे वाढवलेली होती. तसेच पेरू, चिकू, पपई यांचे एकेक झाडे होते. विशेष म्हणजे आमच्या प्लॉटवर एक आंब्याचे, एक फणसाचे, एक जांभळाचे आणि तीन नारळाची अशी मोठी झाडेही  होती. घराभोवतीचा सर्व परिसर हिरवा गार केलेला होता. छान वाटायचे झाडांच्या आणि घराच्या सावलीत !

या घराच्या सावलीत तीस-पस्तीस वर्षे राहिलो. हळूहळू मुले बाहेर पडली आणि आम्हीही बाहेर पडलो. मुलांकडे आलो. पण जेव्हा जेव्हा घराची आठवण येते तेव्हा हेच स्मरणातील घर डोळ्यापुढे येते आणि तेथील स्वप्न फुले स्वप्नासारखी  मनामध्ये उमलू लागतात !

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ हक्क – शिक्षणाचा आणि जीवनाचाही… ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

श्री मकरंद पिंपुटकर

? मनमंजुषेतून ?

☆ हक्क – शिक्षणाचा आणि जीवनाचाही… ☆ श्री मकरंद पिंपुटकर

सन २००५, सप्टेंबर महिना. अमेरिकेतील अराकान्सास राज्याची राजधानी लिटल रॉक्समधील रॉबिन्सन शाळेचा नव्या शैक्षणिक वर्षाचा पहिला दिवस. सगळी मुलं सुट्टी संपवून मित्र मैत्रिणींना भेटण्याच्या उत्साहात होती. 

इतिहास शिकवणाऱ्या मार्था शिक्षिकेच्या डोक्यात मात्र काही तरी वेगळंच शिजत होतं. मुख्याध्यापकांच्या परवानगीने, तिने तिच्या वर्गातली सर्व बाके काढून टाकली होती. वर्गात मुलं आली आणि मोकळा वर्ग बघून भांबावली. 

” मॅम, बाकं कुठे आहेत ? आम्ही बसू कशावर ?”

” त्या बाकांवर बसण्याचा हक्क तुम्हाला कसा मिळाला, हे जर तुम्ही सांगितलंत, तरच मी तुम्हाला बाकांवर बसू देईन.” 

मुलांच्या चेहऱ्यावर भली थोरली प्रश्नचिन्हं…  

“आम्ही चांगले गुण मिळवले म्हणून …” एकाने धीर करून सुरुवात केली. मार्थाची मान नकारार्थी हलली. 

“आम्ही चांगले वागतो म्हणून …” आणखी एक प्रयत्न. 

“चांगली वागणूक, चांगले गुण – या दोन्ही गोष्टी चांगल्या आहेतच. पण बसायला बाक मिळण्यासाठी त्या पुरेशा नाहीत.” मार्था.

प्रत्येकजण आपापल्या परीने कारणं सांगत होता, पण योग्य उत्तर काही गवसत नव्हतं. 

पहिला तास संपला, दुसरा, तिसरा, चौथा. मधली सुट्टी झाली. शाळाभर बातमी पसरली, मुलांनी आपल्या आईवडिलांना कळवलं, वृत्तवाहिन्यांना या घडामोडींचा सुगावा लागला. शाळेत गर्दी जमू लागली. तर्क वितर्क होऊ लागले.

होता होता शेवटची तासिका सुरू व्हायची वेळ आली. मार्थाचे विद्यार्थी वर्गात जमिनीवरच फतकल मारून बसले होते. विद्यार्थ्यांचे पालक, पत्रकार – कोणी शाळेच्या प्रांगणात, कोणी वर्गाच्या खिडक्यांमधून आत डोकावत होते. 

“ठीक आहे. तुम्ही तुमच्या परीने योग्य उत्तरं देण्याचे चांगले प्रयत्न केलेत. आता मी तुम्हाला खरं उत्तर सांगते.” असं म्हणत मार्थाने वर्गाचं दुसरं दार उघडलं. त्या दारातून, हातात एक बाक घेऊन, एक पूर्ण गणवेशधारी माजी सैनिक वर्गात आला, त्याच्या मागोमाग आणखी एक, आणखी एक…  सैनिकांनी ते सगळे बाक व्यवस्थित लावले आणि बाजूला उभे राहिले.

विद्यार्थ्यांच्या आणि खिडकीतून डोकावणाऱ्या पालकांना – पत्रकारांना हळूहळू थोडा अर्थबोध होऊ लागला होता. 

“या बाकांवर बसण्याचा हक्क तुम्ही मिळवलेला नाहीत. तो या सैनिकांनी तुम्हाला दिला आहे. काहींनी स्वतःचे शिक्षण अर्धवट सोडले असेल, काहींनी मनावर दगड ठेवून त्यांच्या तुमच्यासारख्या लहान मुलांना घरी ठेवलं असेल आणि स्वतः सीमेवर लढायला गेले असतील, बर्फ – ऊन – वारा – पाऊस यांना तोंड दिलं असेल, स्वतः बंदुकीच्या गोळ्या झेलल्या असतील, जीवलग मित्रांना वीरगती प्राप्त होताना पाहिलं असेल – यांच्या त्यागाने, निरलस सेवेने हा हक्क तुम्हाला दिला गेला आहे. आता तुमची जबाबदारी ही आहे की चांगलं शिकून, चांगलं नागरिक बनून सैनिकांच्या या उपकाराचे तुम्ही उतराई व्हाल.”

मार्थाची ही सत्य कथा इथे संपली. 

… पण ही कथा आपल्यालाही तितकीच लागू होते.

अगणित स्वातंत्र्य सैनिकांनी जीवाची बाजी लावली आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं. आपले सैनिक, पोलीस कामावर तैनात आहेत म्हणून आपण सुरक्षित जगू शकतो. आपले आई वडील, शिक्षक या सगळ्या सगळ्यांनी खस्ता खाल्ल्या त्यामुळे आपल्याला हा जगण्याचा हक्क मिळाला आहे. 

…. सचोटीने वागून त्यांच्या या त्यागाला सार्थ, यथार्थ बनवणं हे आता आपलं कर्तव्य हे आहे, नाही का ?

© श्री मकरंद पिंपुटकर

चिंचवड

मो ८६९८०५३२१५   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ नाते जुळते मनाशी मनाचे… ☆ श्री सतीश मोघे ☆

श्री सतीश मोघे

? मनमंजुषेतून ?

☆ नाते जुळते मनाशी मनाचे… ☆ श्री सतीश मोघे

(शिक्षक दिनानिमित्त)

तिच्याबरोबर काही वेळेला मॉलमध्ये जाणे घडते. ती शिक्षकी पेशातली. बऱ्याचदा अचानक ३० ते ४५ या वयोगटातले तरुण जवळून जातांना थबकतात आणि म्हणतात,  “आपण मोघे मॅडम ना ! मॅडम ओळखलत? मी १९९३ बॅचचा… मी १९९६ बॅचचा…. ” आणि काही बोलायच्या आत ते वाकून नमस्कार करतात. “ मॅडम अजूनही तुम्ही शिकवलेला धडा आठवतो.” कुणाला शिकवलेली कविता आठवते, कुणाला केलेली आर्थिक मदत आठवते, तर कुणाला दिलेला आत्मविश्वास… तो दिवस हिच्या आयुष्यातला सर्वात आनंदाचा, धन्यतेचा दिवस असतो. तिच्या शिक्षकी पेशापुढे मला माझे अधिकारीपण थिटे वाटायला लागते. जगातल्या कुठल्याच क्षेत्रात, शेवटच्या श्वासापर्यंत अखंडपणे असा सन्मान आणि धन्यता  लाभत नाही.  ते पवित्र नाते पाहून परमेश्वराने पुढच्या जन्मी शिक्षक करावे, असे का कुणास ठावूक त्याक्षणी वाटू लागते.

हे असे बऱ्याच ठिकाणी घडते. प्रसंग मॉलमधला सांगण्याचे कारण एव्हढेच, की या नात्याच्या भेटीसोहळ्यात वेशभूषाही आडवी येत नाही, एव्हढे हे नाते पक्के असते. ही तिथे साडीमध्येच असते असेही नाही आणि तोही विद्यार्थ्यांच्या पेहरावात असतोच, असे नाही. पण या नात्यात आदरयुक्त भावनेचे प्रोग्रॅमिंग विद्यार्थ्यांच्या मेंदूत कायमचे झालेले असते आणि ‘लाईफटाईम ॲन्टी व्हायरस कीट’ या नात्यात “इनबिल्ट” असते.अगदी आई वडिलांच्या आणि मुलांच्या नात्यातही दुराव्याचा,गैरसमजाचा व्हायरस आल्याचे काही ठिकाणी दिसते.पण या नात्यात ते अपवादाने नाही. त्यामुळे समोरची व्यक्ती माझ्या प्रेमयुक्त आदराची आहे, याबाबत मन, बुद्धी आणि देहाचे कधी नव्हे ते क्षणात ऐक्य होते आणि नमस्काराची कृती होते. आपल्या शिक्षकांबाबतही आपले असेच होत असते.

परवाच माझे एक स्नेही, सेवानिवृत्त प्राध्यापक श्री. मित्रगोत्रीसर घरी मुक्कामाला होते. सोलापूरच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात त्यांनी अध्यापनाचे कार्य केले. ते ठाण्यात येणार हे कळताच ,परिसरातल्या त्यांच्या विद्यार्थ्यांचे फोन सुरु. स्टेशनवर स्वागत, घरी घेऊन जाणे, पुन्हा स्टेशनवर पोहचविणे, प्रेमाचा आग्रह, भेट होताच सर्वांचा वाकून नमस्कार, या सर्व गोष्टी पाहून शिक्षकी पेशातल्या व्यक्ती खरेच नशिबवान असे वाटले,.त्यांचा हेवाही वाटला.

या मंडळींना स्वत: ऐश्वर्यवान होण्यापेक्षा विद्यार्थी ऐश्वर्यवान झालेले पाहणे आवडते. पंखात बळ देऊन, भरारी घेण्याचा आत्मविश्वास देऊन विद्यार्थ्यांचा निरोप घ्यायचा, पुन्हा नवीन आलेल्या विद्यार्थ्यांना घडवत राहायचे. हे ज्ञानदानाचे,विद्यार्थी घडविण्याचे अग्निहोत्र प्रज्वलित ठेवण्याचे पुण्यकर्म करणाऱ्या सर्वच शिक्षकांना वंदन.

आजचा दिवस शिक्षणपद्धती, शिक्षक यांच्या दोषांविषयी बोलण्याचा नक्कीच नाही. शहरी आणि ग्रामीण भागातल्या समस्या, गरजांमध्ये झालेले बदल, तात्विक अधिष्ठानात झालेले बदल हे तुमच्या आमच्यात, डॉक्टर, वकील इत्यादी सर्वच पेशात झालेले आहेतच. तेव्हा यात ‘सर्व बदलले ते ठीक, पण शिक्षकांनी तरी बदलायला नको, त्यांनी पूर्वीप्रमाणेच त्यागी, तत्वनिष्ठ रहावे,’ असे म्हणून त्यांच्यावरच नैतिकतेचा, तत्वनिष्ठतेचा बोजा टाकणे, योग्य वाटत नाही. तीही माणसेच आहेत. आपण बदललो, तीही बदलली आहेत.

अजूनही चांगल्या शाळा, महाविद्यालये आहेत. चांगले शिक्षक, प्राध्यापक आहेत. जे चांगले आहेत, तेच पुढे आठवणीत राहतील…मनाशी मनाचे नाते  जुळलेले राहील आणि खूप वर्षांनी जरी अशा शिक्षकांना विद्यार्थी भेटले, तरी ते तेव्हाही निश्चितच त्यांना वाकून नमस्कार करतील. 

सर्व आदरणीय शिक्षकांविषयी अशाच भावना आहेत:

 कधी तर नाहीच,

कधीतरी क्वचित

होते त्यांची भेट

जावून बसले

असतात मात्र

 आपल्या काळजात थेट !

सर्व शिक्षक बांधवांना शुभेच्छा आणि वंदन…

© श्री सतीश मोघे

मो – +91 9167558555

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून  ☆ कृष्ण : माझ्या मनातला ☆ प्रा. सुनंदा पाटील ☆

प्रा. सुनंदा पाटील

? मनमंजुषेतून ?

☆ कृष्ण : माझ्या मनातला ☆ प्रा. सुनंदा पाटील ☆

श्रावण महिना आला की, सणांची रेलचेल असतेच असते. अगदी भराडी गौर, शिवामूळ, मंगळागौरी, नागपंचमी, शुक्रवारची सवाष्ण, वरदलक्ष्मी व्रत, राखी पौर्णिमा, जन्माष्टमी, पिठोरी मातृपूजन, पोळा ! दर दोन तीन दिवसाआड येणारे सण.

सर्व सणांचं ठीक आहे. पण मला नेहमीच जन्माष्टमीचं कायम नवल वाटायचं. श्रीरामजन्म, श्री दत्त जन्म  श्री हनुमानजन्म, जवळपास सगळेच मंदिरात होतात. मात्र कृष्णजन्माचा उत्सव हा मंदिरांसोबतच प्रत्येक घरी होतो. माझ्या माहेरी तर जन्माष्टमीला आम्ही गोकुळाष्टमी म्हणायचो. माझे वडील प्रख्यात मूर्तीकार. सकाळी आंघोळ झाली की ते गोकुळ करीत बसायचे. प्रारंभी गणपती, नंतर श्रीकृष्ण, वसुदेव, देवकी, नंद, यशोदा, राधा, काही गौळणी, अगदी पूतनामावशी सुद्धा. काही गायी वासरं, कालिया. श्रीकृष्णाचे मित्र वगैरे. मजा यायची. आम्हाला कुठलं काय येतंय ? पण शिकवण्याचा कुठलाही आविर्भाव न आणता बाबा आम्हाला मातीकाम शिकवायचे. माणसं, प्राणी करणं कठीणच प्रकरण होतं. मग कुठे पाण्याचं टाकं, नाग, गौळणीच्या डोक्यावरचा माठ, फळं, ताकाचा डेरा असं काहीतरी करायचो. पुढे पोळ्यालाही वाडबैल वगैरे करताना तीच त -हा ! बाबा एकच वाक्य बोलायचे. ” आज ओल्या मातीला हात लावला नाही  तर पुढला गाढवाचा जन्म मिळतो. ” झालं. गाढव कोण होणार ? म्हणून आम्हीही करायचो. कळत नकळत असं कलेचं शिक्षण मिळत गेलं. नंतर त्यांची साग्रसंगीत पूजा नैवेद्य व्हायचा. दुपारी रात्रीच्या भजनाची आणि सुंठवड्याची तयारी असायची.

रात्रीचं भजन छानच रंगायचं. पंचपदी, शिक्का, गजर झाला की इतर भजनं व्हायची. त्या दिवशी कृष्णाची गाणी जरा जास्तच व्हायची. नंतर गवळण. ती झाली की कृष्णजन्म. कृष्णजन्म होताच गुलालाची उधळण होई. मग कृष्णाचा पाळणा. त्यावेळी घरातल्या स्त्रियाही त्यात सहभागी होत. शेवटी आरती आणि सुंठवड्याचा प्रसाद.

दुसऱ्या दिवशी पुन्हा भजन आणि गोपालकाला. हे सर्व झालं की गोकुळाचं विसर्जन. इकोफ्रेंडली हा शब्द आज सर्वांना ठावूक झालाय, पण शंभर वर्षांपासून किंवा त्याच्याही आधी माझ्या माहेरी तो होता. कारण गोकुळाचं विसर्जन पाण्यात न होता, परसातल्या दोडक्याच्या किंवा पडवळाच्या झाडाखाली व्हायचं. सगळं गोकुळ आम्ही त्या वेलांच्या मुळाशी ठेवायचो. पूर्वी श्रावणात श्रावण बरसायचा. रंग नसायचेच त्या मुर्त्यांना. हळूहळू ती ओली माती मातीत मिसळून जायची.अनेकांच्या घरी हा कुळाचार पण आहे.

मला बालपणी पडलेला प्रश्न हाच होता, की कृष्णजन्म घरोघरी का होतो ? ब्रह्मा विष्णू महेश हे ठावूक होतं. उत्पत्ती स्थिती लय. पण स्थिती म्हणजे विष्णूरूप रामाचेही होते.. आदर्श पुत्र, आदर्श भ्राता, आदर्श राजा. एकपत्नी, एकवचनी, एकबाणी प्रभू रामचंद्र. लहानपणी कळत नव्हतं पण जसजशी मोठी होत गेले तेव्हा स्वतःच विचार करू लागले. आजही कृष्ण कळला नाहीच. जरासा विचार केला एवढंच. रामाबद्दल वाटतो तो आदर. आदरयुक्त प्रेम. आणि कृष्ण वाटतो सखा. मनापासून प्रेम करावं असं वाटणारा.

आपल्या कुळाचाराचे देव कुण्या मोठ्या घरी असतात किंवा परंपरेने आपल्याकडे आलेलेही असू शकतात. पण सामान्यपणे आपल्या देवघरात कोण असतं ? श्री गणपती, अन्नपूर्णा आणि रांगता बाळकृष्ण ! सासरी जाताना आई लेकीला अन्नपूर्णा देते. ” तूही तुझ्या घरची अन्नपूर्णा हो ” असा आशीर्वाद देते. आणि दुसरा असतो बाळकृष्ण. मित्र, तत्वज्ञ आणि मार्गदर्शक ! देवाची पूजा करताना  ती मुलगी हळुवारपणे बाळकृष्णाला आंघोळ घालते. त्याचे वस्त्र बदलते. त्याला मुकुट, गळ्यात साखळी, हातात पायात कडे तोडे घालते. नटवते. सजवते. जसं आपल्या बाळाशी वागावं तशी ती लाडिक वागते. राखी पौर्णिमेला ती त्याला राखी बांधते, स्वतःचा रक्षणकर्ता मानते. घरात काही घडलं तर त्याच्या कानात सांगते. जसं जिवाभावाच्या मित्राशी बोलावं तसं. आधार वाटतो त्याचा. आणि कधी काही सुचेनासं झालं की, त्याचाच सल्ला घेते.

कृष्णाने काय शिकवलं ? तुमचं कर्म तुम्हीच करा. यश आहेच. कारण मी पाठीशी आहे. सोबत आहे. कृष्णाने कुठला त्याग नाही केला ? जन्मतः च आईबाप दुरावले, नंतर नंद यशोदा दुरावले, राधा दुरावली, गोकुळ दूर गेले. असाही त्याग ? पुन्हा मागे वळून न बघण्याचा ? द्रौपदी सखी त्याची. तिचं लज्जारक्षण करणारा सखा तिचा.असूराच्या तावडीतून सोळा सहस्त्र एकशे नारींची त्याने सुटका तर केली. पण पुढे समाजातलं त्यांचं स्थान काय.. म्हणून त्यांना स्वतःचं नाव दिलं. पती म्हणून. बालपणी गुरं राखली, आणि मोठेपणी मित्राच्या रथाचा सारथीही झाला. त्याला योग्य मार्गदर्शन करीत जय मिळवून दिला.

…… आणि एवढं सगळं करूनही अलिप्त तो अलिप्तच राह्यला.

आपल्या मुखातून मातेला ब्रह्मांडाचे दर्शन घडवणारा कृष्ण माझ्या एवढ्याशा शब्दात बांधला जाणार आहे होय ? पण खरंच एवढं कायम वाटतं की, पुत्र, पिता, सखा, मित्र, अगदी पळवून नेणारा प्रियकर आणि नवरासुद्धा श्री कृष्णासारखाच असायला हवा.

© प्रा.सुनंदा पाटील

८४२२०८९६६६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ देवदूत : अर्शद सईद भाग-२ ☆ श्री सुनील काळे ☆

श्री सुनील काळे

? मनमंजुषेतून ?

देवदूत : अर्शद सईद भाग-२ ☆ श्री सुनील काळे 

   अर्शद सईद

(मला तर सगळे प्रकरणच रोमांचकारी वाटू लागले. आणि त्या डोक्यावर छत्री नसलेल्या पण डोक्यावर हुडी घालून नखशिखान्त भिजणाऱ्या तरुणाला मी घरात घेतले.) — इथून पुढे — 

माझ्या घरात सगळीकडे फ्रेम करून लावलेली चित्रे होती. ती त्याने प्रामाणिकपणे व्यवस्थित पाहीली पण त्याची नजर काही तरी वेगळे चित्र शोधत होती. मग मी माझी नुकतीच पूर्ण केलेली पावसाची, दाट धुक्याची, जलरंगातील चित्रे दाखवली. आणि अर्शद एकदम खुष झाला. 

येस, येस, 

आय वाँट धिस टुडेज रेनी सिझन ॲटमॉसफियरीक वंडरफूल पेंटीग्ज.

दिस वील बी गुड मेमरीज फॉर मी. 

असे म्हणत त्याने ती तीन चित्रे सिलेक्ट केली. माझा अकाऊंट नंबर ऑनलाईन पेमेंटसाठी  विचारला पण माझ्याकडे तशी त्यावेळी सुविधा नव्हती. मग तो क्रेडीटकार्डची सुविधा उपलब्ध आहे का? असे विचारु लागल्यावर मी नकार दिला. कारण मी त्यावेळी ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करणे एवढे सुरक्षित नव्हते.मग एटीएम मधून रोख पैसे देण्याचा पर्याय नक्की झाला.  बबल रोलच्या प्लॅस्टीकमध्ये गुंडाळलेली व्यवस्थित पॅक केलेली चित्रे त्याच्या गाडीतून अर्शदने मागच्या सीटवर ठेवली व आम्ही पाचगणीच्या शॉपींग सेंटरच्या पोस्टाशेजारच्या स्टेट बँकेच्या एटीएमला गेलो. त्याने पेमेंट काढून रक्कम हातात दिली.मग कितीतरी दिवस मनात साचलेले एक मोठे ओझे दूर झाल्याने मी रिलॅक्स झालो. कारण ती रक्कम पावसाळ्याचे चार महिने पुरेल इतकी होती.आणि एटीएम शेजारच्याच पुरोहीत नमस्ते या हॉटेलमध्ये आम्ही निवांतपणे कॉफी पिण्यासाठी गेलो.

मला तर  फारच आश्चर्य वाटत होते की इतक्या धुवांधार पावसात हा माणूस माझ्याकडेच चित्र घ्यायला का आला असावा ? त्याला कोणी रेफरन्स दिला ? त्याला चित्रेच का घ्यावीशी वाटली ? तो या गावात शिकला,त्याचा व पाचगणीचा काय संबंध ? माझे अनेक प्रश्न मी त्याला विचारले. पण अर्शदने थोडक्यात प्रश्नांची उत्तरे दिली. 

आज खूप वर्षानंतर मी पाचगणीला आलो. शाळेत असताना हा वादळी पावसाचा दिवस, कडाक्याची थंडी, हे धुके मला सतत आठवत असते. आज सध्यांकाळी मी लॅपटॉपवर सहज पाचगणी पेंटीग्ज या नावाने सर्च मारला तर तुमच्या पेंटिंगचे फोटो दिसले. कुठूनतरी अचानक एक अज्ञात शक्तीने सुचवले किंवा मनात विचारांचे वादळच उठले की आताच जावून या चित्रकाराला भेटलेच पाहीजे. मी आता परदेशात स्थायिक झालो आहे.मनातल्या साचलेल्या या पावसाच्या धुक्याच्या आठवणी  चित्ररुपाने मला नेहमीच या परिसराची,तुमची व येथील पाचगणीच्या या भेटीची आठवण करून देत राहतील. प्रेमाने गळाभेट घेऊन आम्ही एकमेकांचा निरोप घेतला आणि माझी प्रत्यक्ष अनुभवलेली,घडलेली खरी  गोष्ट इथे संपली. 

डोक्यावर हुडी घालून चाललेला पाठमोरा अर्शद त्यादिवशी मला देवदूतासमान वाटला. कित्येक वर्ष ह्या नखशिखान्त पावसात ओलाचिंब झालेल्या या देवदूताची प्रतिमा मनाच्या अज्ञात पोकळीत स्वस्थ बसून राहिली होती आज या थिंक पॉझिटिव्हच्या लेखामूळे पुन्हा जागृत झाली, पुन्हा आठवली.

खरं तर मी नास्तिकही नाही व आस्तिकही नाही. मी नियमित देवपूजा व मंदिरानां भेटीही देणारा धार्मिक माणूस नाही. पण गेले कित्येक वर्ष  मला हा प्रश्न सतावतो की हे अज्ञात देवदूत मला का भेटत गेले ?  या देवदूतांचे वैशिष्ठ्य म्हणजे ते वेगवेगळ्या धर्माचे, वेगवेगळ्या जातीचे, वेगवेगळ्या ठिकाणांचे, वेगवेगळ्या देशांचे, वेगवेगळ्या वर्णाचे, स्त्री किंवा पुरुष असो वेगवेगळ्या रुपाने अडचणींच्या वेळी हजर कसे होतात ? आणि ते कधीकधी परत भेटतात किंवा कधी आयुष्यात भेटतही नाहीत. आपण कोणाला मदत केली किंवा मार्गदर्शन करून नवा रस्ता  दाखवला याचा त्यानां कधी अभिमान वाटत नाही. ते कुठे याचा नामोल्लेखही करत नाहीत. त्यांच्या भावविश्वात मी आता मदत केली आहे तर तुमच्याकडून मला परतफेडीची अपेक्षा आहे असे त्यांचे वर्तन कधीही असत नाही.

मी हिंदू आहे व अर्शद मुस्लीम आहे म्हणून आमच्यामध्ये कधी असा दुजाभाव, दुराचाराचा विचार आला नाही. देवदूतानां कुठे धर्म,जात असते

आपल्या आयुष्यातील कठीण काळात सर्वतोपरी छोटी असो वा मोठी मदत करणाऱ्यानां देवदूतच म्हणावे लागेल ना ? 

म्हणजे देवदूतानां जात, धर्म, पंथ नसतो. मग आपण का जात,धर्म, पंथ व हिंदूत्व कवटाळून बसतो. मी तर मंदिराच्या परिसरात चित्र रेखाटण्यासाठी जात असूनही कधी आत जात नाही. देवाच्या दर्शनाला रांग दिसली की लांबूनच हात जोडतो. आणि देवाला मनातूनच सांगतो बाबा रे ! तुला तर माहीतच आहे की तुझ्यापासून काहीही लपवू शकत नाही.तू तर सर्वज्ञ आहेस, सगळीकडे तुझा वावर असतो मग रांगा लावून तुझ्याकडे येण्यासाठी वेळ कशाला घालवू ? रांगेत फुकट वेळ घालवायचा याला काय अर्थ आहे ? तू जे अडचणींच्या काळात मनुष्यरूपी देवदूत पाठवतोस ते काय कमी आहे का ? मग मनातूनच माझा नमस्कार स्विकार कर. 

यु नो एवरीथिंग अबाऊट मी.

आजही कधीतरी  मोठी अडचण आली की मला परत कधीही न भेटलेल्या हुडीवाल्या देवदूताची प्रतिमा आठवते. माझा तीस पस्तीस वर्षांचा चित्रकलेचा प्रवास अशा ज्ञात अज्ञात देवदूतांनी सुखकर करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी,वेगवेगळ्या मार्गाने अचानक प्रकट होवून भरघोस यशाशक्ती मदत केली. आमची चित्रकला बहरली, फुलली संपन्न झाली त्या या देवदूतांमूळेच. या सर्व जातीच्या, धर्माच्या, पंथांच्या मानवी सजीव देवदूतानां आज यानिमित्ताने मी नतमस्तक होऊन सप्रेम नमस्कार करतो.

मन, शरीर, बुद्धी व आत्मा या चार जीवनातील गोष्टींचे योग्य संतुलन असले की देवदूत भेटतातच, किंवा भेटले नाही तर कधी कधी आपणच कोणाचा तरी देवदूत बनून समोरच्या व्यक्तिच्या आयुष्यातील अडचणी सोडवण्यासाठी थोडा प्रयत्न केला, त्याची चिंतामग्न अवस्था समजून हातभार लावला, खरी मदत जर केली तर या जन्मात आपणही एक छान कर्म केल्याचे मानसिक समाधान नक्की मिळेल.

मी जरी शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी कधीही गेलो नाही तरी त्यांचे दोन शब्द मला नेहमीच प्रेरणा देतात. 

‘श्रध्दा’ और ‘सबुरी’.

आपल्या कामावर असलेली निस्पृह  निष्ठा,मनात असलेली प्रामाणिक इच्छाशक्ती व आपल्या जोपासलेल्या कोणत्याही क्षेत्रातील व्यावसायिक काम असो किंवा तुमच्या आवडत्या कलेवर असलेले निर्व्याज सच्चे  प्रेम असेल तर ध्येयपूर्ती व स्वप्नपूर्ती करायला एक दिवस  देवदूत नक्की भेटायला येतो.तो नवनव्या वेषात येतो. कधी तो सरकारी अधिकारी म्हणून येईल, तर कधी शिक्षकाच्या, मित्राच्या रुपाने प्रकट होईल. कधी काळ्या कोटात वकीलाच्या रुपाने येईल तर कधी पांढरा कोट घालून डॉक्टरांच्या रुपाने येईल. कधी साध्या वेशात येईल, कधी टाय सुटबुटातील पोशाखात उद्योजकाच्या रुपाने येईल तर कधी हुडीवाला पोशाख घालून शांतपणे सुखाची पखरण करत व मदत करून निघून जाईल.

पण पक्का विश्वास ठेवा स्वतःवर 

एक दिवस अचानक हुडीवाला देवदूत नक्की भेटायला येतो.

एक दिवस अचानक हुडीवाला देवदूत नक्की भेटायला येतो.

🌟 🌟 🌟 🌟

(माझ्या चित्रकलेच्या अडचणीच्या संघर्षाच्या प्रवासात या हुडीवाल्या देवदुताला मी पार विसरूनच गेलो होतो. लेख लिहील्यानंतर त्या रात्री कित्येक वर्षांनी देवदूताचा गुगल, फेसबूक अशा समाज माध्यमांवर शोध घेतला तर देवदूत सापडला. मेसेंजरवर रात्री त्याला उशिरा मेसेज पाठवला तर देवदूताने मोठ्या उत्स्फूर्तपणे लगेच मला प्रतिसाद दिला. आपण आपल्या धकाधकीच्या जीवनात देवदूताना विसरतो पण देवदूत कधीच आपल्याला विसरत नसतात. या देवदूताचा चेहरा मला आठवत नव्हता. आज खूप वर्षानंतर त्या देवदूताचा बायोडाटा पाहीला तर हा स्मार्ट देवदूत त्यावेळी जागतिक बँकेचा प्रेसिडेंट होता.त्यांचा फोटो सुरुवातीला मुद्दाम दिला आहे.) 

– समाप्त –

© श्री सुनील काळे

संपर्क – 32, निसर्ग बंगला, मेणवली रोड, स्वप्नपूर्ती मंगल कार्यालयाजवळ, मु .पो. भोगाव, ता. वाई, जि.सातारा – ४१२८०३. 

मेल : [email protected]

मोब. 9423966486, 9518527566

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ देवदूत : अर्शद सईद भाग-१ ☆ श्री सुनील काळे ☆

श्री सुनील काळे

? मनमंजुषेतून ?

देवदूत : अर्शद सईद भाग-१ ☆ श्री सुनील काळे 

   अर्शद सईद

मी निसर्गचित्रकार म्हणून जगायचे ठरवले होते . निसर्गात सतत फिरायचे निसर्गाच्या सान्निध्यात राहून जी निसर्गदृश्ये मनाला भुरळ घालतात ती जलरंगात उतरवत राहायचे हा माझा आवडता छंद आहे .

मी पाचगणीत राहायचो . हे तर महाराष्ट्राचे स्वित्झर्लंड. निसर्गाने येथे दोन्ही हाताने भरभरून निसर्गवरदान देलेले गाव .अशिया खंडातील सर्वात मोठे टेबललॅन्डचे पठार , त्या पठारावरून दिसणारी चिखली , पांगारी ,भिलार , तायघाट , भोसे , राजपूरी गावांची व्हॅलींची दृश्ये , स्ट्रॉबेरीची शेती , उंचच उंच सिल्व्हर वृक्षांच्या सान्निध्यातील ब्रिटीशकालीन शाळा व बंगले . हिलस्टेशनची टिपिकल उतरत्या छपरांची घरे , धोम धरणाचे चमकणारे पाणी , कमळगड , नवरानवरीचा डोंगर , महाबळेश्वरच्या सह्याद्री व प्रतापगडाच्या पर्वतांच्या विशाल रांगा , जावळीचे खोरे , वाईचे गणपती मंदीर ,पेशवेकालीन दगडी घाटांचा परिसर व मेणवलीचा घाट चित्रित करताना मी देहभान हरपून जायचो . त्या दृश्यानां कागदावर जलरंगात रेखाटण्याचा माझा छंद इतका विकोपाला गेला होता की माझ्या घरच्यांनी मला पुर्णपणे दुर्लक्षित केले होते.

मी अभिनवला शिकलो व तेथे माझी स्वातीशी मैत्री झाली . नंतर लग्नही झाले पण आम्ही मुंबई पुण्यासारख्या शहरात रमलो नाही . चित्रं काढली तरी ती विकायची कशी याची आम्हाला जाणीव नव्हती . आम्ही तीनचार ठिकाणी स्वतःची आर्ट गॅलरी तयार करून प्रदर्शन आयोजित केले . पण त्यात आम्हाला यश आले नाही. त्यात एकुलत्या एक मुलीचा मृत्यू झाला व नाईलाजाने मला व स्वातीलाही आर्टटिचरची नोकरी करावी लागली . चित्रकारीता पूर्ण बंद करून टाय सूटबूट घालून मी एका ब्रिटीश स्कुलमध्ये स्थिरावलो . या स्कूलमध्ये नाश्ता ,जेवण , राहण्यासाठी बंगला , लाईटबील फ्री व इतर सर्व काही सुविधा होत्या पण पगार खूप कमी होता . सकाळी सात ते रात्री सात पर्यंत बारा तासांची व्यस्त नियोजनबद्ध बांधीलकी होती . फक्त रविवारची एक सुट्टी . चारपाच हजारात सर्व गरजा भागविण्यासाठी संघर्ष करायला  लागायचा. शेवटी कंटाळून आम्ही एकापाठोपाठ या पर्मनंट सुखाच्या नोकऱ्या कायमच्या सोडल्या व चित्रकार म्हणूनच जगायचे या वेड्या ध्येयाने प्रेरीत होऊन नवा प्रवास सुरू केला .

पाचगणी गावाजवळ असलेल्या रुईघर व्हॅलीत गणेशपेठच्या गावाबाहेर आम्ही एक जागा घेतली . या जागेला जायला सत्तर ऐंशी पायऱ्या चढून जायला लागायचे. घर बांधताना गाढवावर वाहून वीट वाळूची वाहतूक करावी लागली . समोर महू धरणाचे विहंगम दृश्य दिसणार होते . भिलार व कासवंड गावाची व्हॅली समोर दिसायची . आम्ही घरबांधणी सुरु केली आणि लवकरच सर्व प्रकारच्या सामानाची वाहतूक करताना येणाऱ्या अडचणींमूळे घराचे बजेट दुप्पट झाले . लवकरच पैसे संपले . चित्रकलेची साधना करत आता जगायचा नवा प्रयत्न आम्ही सुरु केला होता पण स्थिर पगार नव्हता .महिना संपल्यानंतर घरसामान किराणा वस्तू तर विकत आणायला लागणारच होत्या. त्यात सामान वाहतूक व साफसफाईसाठी सुधाकर कांबळे नावाचा गडी कामाला ठेवला होता . त्याला महिन्याला पगार द्यायचे ठरले होते . जीवन जगणे एक कठिण समस्या होती . पैशांशिवाय जगणे म्हणजे मोठी परीक्षाच समोर आली होती .

कलावंत मंडळी थोडी वेडी असतात , त्यानां व्यवहारज्ञान नसते , जगरहाटीचे सर्वसामान्य जगणे त्यानां माहीत नसते असे सगळेजण म्हणतात ते खरे असावे . व्हॅन गॉग नाही का व सतत चित्र काढत फिरायचा तशीच काहीशी माझी मनाची अवस्था झाली होती . आणि येथे तर दोन व्हॅनगाँग होते .असे रोज कलेसाठी वेडे होऊन जगणे म्हणजे रोज विस्तवावरून चालणे असते . जाणूनबूजून नेहमीची तयार वाट सोडून काट्याकुट्यातून प्रवास करत एका अनोळख्या , नव्या अवघड मार्गाचा तो प्रवास असतो . आम्ही अशा काट्यातून प्रवास करत असताना वास्तवात जीवन जगणे किती कठीण असते याची प्रॅक्टीकल झळ आम्हाला वारंवार बसत होती . पण नोकरी करायची नाही या मतांवर मात्र आम्ही दोघेही ठाम होतो .

आम्ही कलावंत आहोत , आम्ही  चित्रांसाठी जगतो ना? मग चित्रांनी आम्हाला का जगवू नये ? असा ठाम विचार मनात घेऊन आम्हीच निर्माण केलेल्या प्रश्नाला आम्हीच उत्तर देत होतो . ” चित्रांनीच आम्हाला जगवले ” पाहीजे हे नवे जीवनसूत्र डोळ्यासमोर ठेऊन जगत होतो . रोज चित्र काढणे, चित्र रंगवणे, चित्रमय राहणे म्हणजे जगणे. आपले जीवन जगणे म्हणजे चित्रनिर्मितीशी १००% प्रामाणिक राहणे या सुत्रांवर आमचे प्रयत्न सुरू असायचे . आलेला दिवस आम्ही आनंदाने चित्रमय जगत मस्त एन्जॉय करत होतो.

विहीरीत पाण्याचा साठा असला तरी विहिरीच्या तळाशी सतत जिवंत निर्झर वाहणारे झरे असावे लागतात तरच विहीर सतत पाण्याने भरत असते . तसे रोजचे जगण्यासाठी पुरेसा पैशांचा साठा असला तरी सतत नवीन पैशांचा पुरवठा करणारी यंत्रणा लागतेच . अन्यथा जवळ असलेला साठा एक ना एक दिवस कधीतरी संपतोच आणि ती वेळ आमच्यावर लवकरच आली . त्याचे मुख्य कारण म्हणजे पावसाळा .

महाबळेश्वर हे महाराष्टातील सर्वात जास्त पाऊस पडणारे गिरिस्थान आहे . त्याच्या शेजारी असलेलया पाचगणीतही कधीकधी प्रचंड पाऊस पडतो . त्यात आम्ही डोगरांच्या व्हॅली फेसिंगला राहत होतो . पावसाळ्यात कडाक्याची थंडी , धुके व पावसाचा तडाखा कायम लक्षात राहील असा असतो , कारण आमच्या घरावर पत्रा बसवला होता . या पत्र्यावर पावसाचा जोर वाढला की दणादण पावसाच्या गारांचा , पाण्याचा वर्षाव व्हायचा . पडणाऱ्या गारा दगडासारख्या टणाटण पत्र्यावर आपटायच्या . निसर्गाचे हे रौद्र रूप आम्हाला त्यावेळी विलोभनीय वाटायचे . पावसाळ्यात पर्यटकांची संख्या खूपच कमी व्हायची . शाळा  जून महिन्यांमध्ये नियमित  सुरु झाल्यामुळे पालकवर्गही यायचा नाही . त्यामुळे चित्र विकत जाण्याची अजिबात शक्यता नसायची . अशा वेळी शांतपणे बसून चित्रनिर्मिती करणे एवढेच हातात असायचे . पण महिन्याच्या गरजा भागविण्यासाठी पैसे कसे कमवायचे ? याची चिंता नेहमीच असायची . असाच चिंतामग्न अवस्थेत असताना तो दिवस उजाडला. जो भावलेला व कायम मनात घर करून राहिला आहे .

त्यादिवशी भयानक गारांचा पाऊस कोसळत होता. गारांमुळे पत्र्यावर दगडांचा वर्षाव झाल्यासारखे वाटत होते . सगळीकडे धुक्याचे इतके दाट पदर पसरले होते की पाचसहा फुटांवरचेही ढगाळ वातावरणामूळे  काहीही दिसत नव्हते . दिवसभर पाऊस ,पाऊस आणि नुसता  पाऊस . पावसामुळे हवेत गारठा वाढलेला होता . त्यात लाईट गेल्यानंतर तर नुसते बसून राहणे एवढेच हातात होते . मुख्य रस्त्यालगत मोठे लोखंडी गेट बसवले होते त्यानंतर सत्तर पायऱ्या चढून रात्रीच्या वेळी कोणी येण्याची शक्यता नव्हतीच . बंगल्यासमोर दुसरे गेट कुलूपबंद करून आम्ही दोघे निवांत बसून राहिलो होतो . बाहेर प्रचंड प्रमाणात पाऊस पडत होता व मनात पैशांची, रोजच्या जगण्याची  चिंता खूपच भेडसावत होती त्यामुळे थोडासा अंधारही भयानक काळोखासारखाच भासत होता .

रात्रीचे सातआठ वाजले असावेत . रात्रीच्या जेवणाची वेळ झाली होती . स्वाती जेवणाची तयारी करण्यासाठी किचनमध्ये गेली होती . हॉलमध्ये मी निराश मनाने बसून राहिलो होतो आणि अचानक खालच्या पायऱ्याशेजारचे गेट कोणीतरी उघडल्याचा आवाज आला . मी खाली डोकावले तर डोक्यावर हुडी असलेले जॅकेट घालून कोणीतरी अज्ञात तरुण व्यक्ती हळूहळू पायऱ्या चढून येत होती . पायऱ्या चढून आल्यावर  मोठे बंगल्याचे गेट कुलूपबंद असल्याने मी घाबरलो नाही . त्या अनोळखी हुडीवाल्या तरुणाने दरवाजात उभा राहून मला हाक मारली . 

मिस्टर काळे , प्लीज ओपन दी गेट ! 

आय वाँट टू बाय युवर पेटींग्ज . 

मी तर चकीत झालो . एवढया मोठया दाट धुक्याच्या पावसात  चिंब भिजलेली कपडे घालून सत्तर पायऱ्यांचा  हा डोंगर चढून कोण अनोळखी  इसम माझ्या दारात चित्र विकत घेण्यासाठी आला असावा ? कदाचित क्षणभर मीच स्वप्नात आहे की काय ? किंवा मनात जास्त प्रमाणात विचार करून मलाच काही  भास होतोय आहे की काय? असेही मला वाटू लागले .

माय नेम इज अर्शद सईद . 

आय एम स्टेईंग अब्रॉड. 

बट आय स्टडीड इन न्यू इरा स्कूल . 

आता हा पाचगणीतील एका शाळेचा माजी विद्यार्थी , ज्याची माझी कधीही भेट झाली नव्हती , अशा अज्ञात व्यक्तीने माझ्याकडे येऊन चित्र विकत घेण्याची इच्छा प्रकट करावी आणि तीदेखील अशा प्रचंड पावसात पूर्णपणे भिजत . मला तर सगळे प्रकरणच रोमांचकारी वाटू लागले . आणि त्या डोक्यावर छत्री नसलेल्या पण डोक्यावर हुडी घालून नखशिखान्त भिजणाऱ्या तरुणाला मी घरात घेतले .

– क्रमशः भाग पहिला. 

© श्री सुनील काळे

संपर्क – 32, निसर्ग बंगला, मेणवली रोड, स्वप्नपूर्ती मंगल कार्यालयाजवळ, मु .पो. भोगाव, ता. वाई, जि.सातारा – ४१२८०३. 

मेल : [email protected]

मोब. 9423966486, 9518527566

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares