जन्माष्टमी म्हणजे श्रीकृष्णाचा जन्म. हा कुणा व्यक्तीचा जन्म नाही. किंबहुना व्यक्तीच्या निमित्ताने नवाच एक विचार पुढे आला आहे. व्यक्ती काल्पनिकही असू शकेल. पण व्यक्तीपेक्षा तो विचार खरा आणि महत्त्वाचा आहे. त्याचे तत्वज्ञान आणि त्याचे चरित्र यातून हा विचार आपल्यापुढे मांडता येतो असे मी मानतो.
लहानपणी श्रीकृष्णाने इंद्राच्या पूजेला विरोध करून गोवर्धनाची पूजा, गाई वासरांची पूजा करण्याचा विचार मांडला. म्हणजेच परंपरा कितीही जुनी असली तरी जे जुने आहे ते पवित्रच आहे असे न समजता, कालमानपरत्वे जुन्या परंपरांचा विचार टाकून दिला पाहिजे. कालमानानुसार जे नवे विचार आहेत त्यांचा अंगीकार केला पाहिजे. ( वाचा ‘दोन शब्दात दोन संस्कृती’ — लेखक वि. दा. सावरकर) श्रीकृष्णाने गीता सांगितली, परंतु गीतेच्याद्वारे त्याने तत्वज्ञान सांगितले ते महत्त्वाचे.
‘मी सर्वकाही आहे, मी असे करतो, मी जगाचा आदि आहे, अंत ही आहे.’ असे तत्वज्ञान त्याने मांडले आहे असे वरकरणी वाटते. परंतु हे तत्त्वज्ञान म्हणजे ‘ मी-पणा ‘ नसून, ‘ मीच आहे माझ्या जीवनाचा शिल्पकार ‘ या प्रकारचे तत्त्वज्ञान मी मानतो. मी जो उपदेश करतो ते तत्वज्ञान मी स्वतः अंगिकारतो असे त्याचे म्हणणे आहे. मी म्हणजे कुणीही व्यक्ती. माझ्या दृष्टीने त्याचा अर्थ इतकाच की जेव्हा माझा जन्म झाला तेव्हाच या विश्वाची निर्मिती झाली. जेव्हा माझा मृत्यू होईल तेव्हा माझ्या दृष्टीने या विश्वाचा अंत होणार आहे.
श्रीकृष्ण मानला जर विश्वाचा शासक, तर त्याचे असे म्हणणे की जो सर्वोच्च पदावर आहे तो तुम्हाला तुमच्या लढाईमध्ये कोणतीही सक्रिय मदत करणार नाही. तो फक्त तुम्हाला तत्वज्ञान सांगेल. कृष्ण म्हणतो ‘ न धरी शस्त्र करी मी, सांगेन युक्तीच्या गोष्टी चार ‘ म्हणजेच सर्वोच्च शासक हा तुम्हाला काही युक्तीच्या गोष्टी सांगेल परंतु तो स्वतः तुमच्या जीवनाच्या युद्धात तुमच्या बरोबर सामील होणार नाही. सक्रीय मदत करणार नाही. उलट त्याचे सैन्य हे तुमच्या विरोधात लढणार आहे. त्याच्या सैन्याला तुमच्या भल्याचं काहीही घेणं देणं नाही. हीच परिस्थिती आज आणि पूर्वीही दिसते आहे नाही का? शासन कोणतेही असो तुमच्या बाजूने लढणारे फक्त तुमचे चार पाच जण असतात जे खरे मनापासूनचे हितचिंतक आणि मित्र असतात. तेच फक्त तुम्हाला मदत करतील. पण लढणारे फक्त तुम्ही आहात. त्यामुळे सर्वोच्च शासकाने कोणत्याही प्रकारे सामान्य माणसाच्या कल्याणाचा विचार केला असला तरी प्रत्येकाला स्वतःची लढाई स्वतःच लढायची आहे. ती लढाई लढण्यासाठी अंधश्रद्धांची झापडे आणि परंपरांच्या कुबड्या उपयोगाच्या नाहीत.
सकारात्मक विचार, जपलेली नाती आणि आयुष्यासाठी लढण्याची जिद्द हीच फक्त उपयोगाची आहे. मला वाटते हेच जीवनाचे तत्त्वज्ञान आपण अनुभवत आहोत. म्हणून हा आजच्या काळातील जगण्याचा महत्त्वाचा विचार आहे असे मला वाटते.
… राम-कृष्ण चरित्रातून अजूनही बरेच विचार आपल्याला जगण्यामध्ये समजून घ्यावे लागतील.
पाचगणीच्या मुख्य रस्त्यावरून महाबळेश्वरकडे जाताना रस्त्यात रश्मी चौक नावाचा बोर्ड दिसतो. त्याच्या बाजूचा रस्ता चेसन रोड आणि याच चेसन रस्त्यावरचं थोडं अंतर चालले की दोन पांढरे शुभ्र पिलर्स व त्यावर इंग्रजीमध्ये “मेडस्टोन ” लिहीलं आहे. तोच तो पेसी विरजी अंकलचा बंगला.
आठ एकर जागेत प्रशस्त ऐसपैस व ब्रिटिशांनी बांधलेला, गेटच्या आत जाताच दोन्ही बाजूला उंचच उंच सिल्व्हर ओकची झाडे आणि प्रशस्त गार्डन. या गार्डनमध्ये बोगन वेलींची कमान आणि उजवीकडे बंगल्याच्या पोर्चमध्ये उभी असलेली शेवाळी रंगाची जुनी फियाट गाडी.
गोरेपान, उंच, पांढरेशुभ्र केस व मिशा ,मिस्किल हास्य, डोळ्यावर जाड भिंगाचा चष्मा, पुढाऱ्यासारखे जॅकेट,वार्धक्याने थकलेली मजबूत शरीरयष्टी.. पण त्यांचा उत्साह मात्र एका तरुणासारखा…………
बंगल्यात प्रवेश करताना डाव्या बाजूला शिलाई मशीनवर सुंदर डिझाईन्स करणारी डॉली आंटी, ती त्यांच्या मोठ्या भावाची विधवा. त्यांचं नाव फिरोज आणि त्यांच्या मृत्युनंतर, आठवणी विसरण्यासाठी सातत्याने मग्न होऊन शिवणकाम करणारी डॉली आंटी . उजव्या बाजूला सागवानी भव्य टेबल व त्या टेबलावर असंख्य वस्तू, पेन स्टँड, फ्लॉवर पॉट, टेलीफोन, जुन्या कागदांची चवड, वर्तमानपत्रे , लिहिण्याचा स्टँड , जुना डायलचा टेलीफोन, प्लंबिंगचे सामान, रंगाचे सामान, ब्रशेस, स्क्रू ड्रायव्हर्स, गाडीचे पाने, ड्रिल मशीन आणि अनेक छोटया मोठया असंख्य सटरफटर वस्तू व त्यापाठीमागे ऐटीत बसलेले पेसी अंकल. ते त्यांचे छोटे ऑफिस कम प्रवेशद्वार. पेसी अंकलची ही स्टाईल मी कित्येक वर्ष पहात होतो.
पेसी अंकल घरगुती पण फक्त पारशी लोकांसाठीच हॉटेल चालवायचे, त्यांच्याकडे फक्त ओळखीचेच लोक राहायचे आणि मग राहायला जणू त्यांचा संपूर्ण बंगला वापरायला द्यायचे. त्यांच्या प्रशस्त हॉलमध्ये त्यांच्या आईचे चित्रकार एस . एल . हळदणकरांनी जलरंगात केलेले पोट्रेट लावलेले होते. त्यांच्या भव्य अशा डायनिंग टेबलवर सगळी गेस्ट मंडळी घरच्यासारखे जेवण करायची. त्यामध्ये कसलीही व्यावसायिकता नसायची. त्यांच्या बंगल्याचे लोकेशनच असे होते की त्यामधून खाली कृष्णा व्हॅलीची सुंदर चिखली गावाची दरी व छोटी छोटी शेती व धोम धरणाचे ,कृष्णा नदीचे विहंगम दृश्य दिसायचे. येणारा प्रत्येक माणूस भान हरपून जायचा.
त्यांच्या या प्रचंड मोठया माडीच्या बंगल्यात राहणाऱ्या व्यक्ती फक्त तीनच…डॉली आंटी, पेसी विरजी, व त्यांची बॉबकट केलेली… ब्रिटीशांसारखी दिसणारी गोरीपान ,थोडी बुटकी , फुलाफुलांचे फ्रॉक घालणारी पत्नी डॅफनी… डॅफनी मूळची ब्रम्हदेशातील ….ख्रिश्चन होती व अंकल तेथे नोकरीसाठी गेले होते त्यावेळी त्यांचा प्रेमविवाह झाल्यामुळे पेसी विरजी अंकलची ती फार लाडकी होती. अगदी प्रेमाने ते तिला
‘ डॉल ‘ म्हणत व तीही त्यांना प्रेमानेच ‘ पेस्तन ‘ म्हणे…………
हे संपुर्ण कुटुंब कलाप्रेमी, कलासक्त व जीवनातील सर्व आनंद घेणारे असे कुटुंब होते. गावापासून त्यांचा बंगला जरा लांब होता. पण रोटरी क्लब , पांचगणी क्लब, पारशी फायर टेम्पलचे ते अध्यक्ष असल्याने ते गावात प्रसिद्ध होते. पांचगणी क्लबमध्ये उन्हाळी सुट्टीत रोज संध्याकाळी हौजीचा खेळ लावत व तो खेळण्यासाठी अनेक पर्यटक, तसेच स्थानिक यांची गर्दी होत असे.
माझी आणि त्यांची ओळखही फार मजेशीर झाली. त्यावेळी मला लँडस्केप हा शब्दही माहीत नव्हता. पण कोऱ्या कागदावर दिसणारी कृष्णानदी व पांचगणीच्या रस्त्यालगतची वडाची व उंचच उंच सिल्व्हर वृक्षांची झाडे , टेबल लॅन्डची पठारे , रेखाटण्याचा मला छंद लागला होता. एकदा असेच रस्त्याच्या बाजूला चित्र काढत बसलो होतो. अगदी तल्लीन झालो होतो. त्यावेळी अचानक गाडी थांबल्याचा पाठीमागून आवाज आला व जोराने टाळ्या वाजवत पेसी अंकलने त्या चित्राला दाद दिली
‘ वेल डन माय बॉय’ !
मराठी शाळेत शिकत असल्याने माझी इंग्रजीची बोंब व त्यांची मराठीची…….पण ते त्यांच्या परीने मराठी बोलण्याचा खूप प्रयत्न करत… टिपिकल पारसी टोन…
पहिल्याच भेटीत ते चित्र पाहून खूप प्रभावित झाले होते. मग त्यांच्या फियाटमध्ये बसवून बंगल्यावर घेऊन आले. त्यांचा सर्व परिसर फिरून दाखविला. माणसांची ती नीटनेटकी अवाढव्य घरे, उंची सागवानी फर्निचर, सोफासेट , टिपॉय, पुस्तकांची भव्य कपाटे, घरातली लावलेली चित्रे, डायनिंग टेबल, असा मोठा थाटमाट मी प्रथमच जवळून पहात होतो. डॉली आंटी व डॅफनी आंटी यांनी माझे फार प्रेमाने स्वागत व कौतुक केले.
पुढे मी तिला ढाफनी आंटी म्हणायचो, कारण आंटीला मोठा चष्मा लावलेला असायचा. पेसी अंकलचे वडील व आजोबा चित्र काढायचे, त्यांची बहीण शिरिन विरजी मोठी शिल्पकार होती . पण पेसी अंकलला चित्रे काढता यायची नाहीत त्यामूळे आपल्या गावात कोणी चित्र काढणारा ” दुर्मिळ ” मुलगा सापडल्याचा त्यांना भारी आनंद झाला होता. दुपारची वेळ होती. मग त्यांनी मला त्यांच्या शेजारी डायनिंग टेबलवर बसून जेवायला थांबवले. भारी थाट होता त्यांचा. समोर ताटाखाली छोटे रुमाल , जेवताना
अॅप्रन, बाजूला ठेवलेले काटे चमचे व चिनी मातीच्या प्लेट्स. त्यादिवशी मटन बिर्याणी , ब्रेड, व मटन करी असा बेत होता. काटा चमच्याने मटन खाणे मला अजिबात जमत नव्हते. मी पूर्णपणे बावरून गेलो होतो . माझे सगळे पदार्थ प्लेट बाहेर पडत होते व तरीही पेसी अंकल हसत हसत मला म्हणत होते. “तू चांगला ट्राय करते……असाच होते, पन तुला जमेल…….”..मला खाताना त्रास होतोय हे पाहून डॅफनी आंटी पेसी अंकलला ओरडली ” Please let him use his hand. Why you are forcing him to eat with forks?” मग त्यांची जुगलबंदी सुरू झाली .. .ती नेहमीचीच होती. पुढे मला ती परिचयाची व सवयीची झाली.
माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदाच टेबलावर बसून जेवत होतो आणि असा प्रेमळ पाहुणचार घेत होतो. मग त्यांनी मला त्यांच्याकडची काही चित्रकलेची पुस्तके दाखवली. आयुष्यात मी पहिल्यांदाच लिओनार्दो, व्हॅन गॉग, टर्नर , मोने ही नावे ऐकली. ती चित्रे पाहून मी एका वेगळ्या विश्वातच गेलो. धुक्यात हरवलेल्या बोटीचे टर्नरचे चित्र आजही माझ्या डोक्यात पूर्णपणे बसलेय .मला जणू खजिनाच सापडला होता . त्या संध्याकाळी एका मंतरलेल्या अवस्थेतच मी घरी आलो . रात्रभर धुके , वारे, हलणारी झाडे, रेल्वे, व टर्नरचे पुस्तक आणि पेसी विरजींचे अवाढव्य घर डोळयांसमोर सारखे सारखे दिसत होते .
मला चित्रात पाचगणीची थंड हवा, धुके, वारे हे सगळे दाखवण्याचा जणू नादच लागला. आणि पेसी अंकलचे ते फेव्हरेट वाक्य……….” असा इफेक्ट आला पाहिजे फॉगचा, फॉगचा फिल आला पाहीजे, हवा आला पाहिजे…….फॉग एकदम पिक्चरमंधी घुसला पाहीजे…….” सतत डोक्यात ही वाक्य घुमायची.
मी चित्र काढत होतो पण मला कोणतीच चित्रशिक्षणाची पार्श्वभूमी नव्हती .मी सायन्स शिकत होतो आणि माझा जीव चित्रांमध्ये अडकला होता . माझी तगमग पेसी अंकलना समजत होती . ” तू सायंटीस्ट नाय आर्टीस्ट हाय, तवा तू आर्ट कॉलेजमंदी जा . लई शिकला पाहीजे तुला ” त्यांचे ते शब्द मला नेहमी प्रोत्साहन देणारे ठरले.
एकदा ठाण्याच्या ठाणे स्कूल ऑफ आर्टच्या नीलिमा कढे मॅडम व वर्षा कुलकर्णी मॅडम पाचगणीत माझ्या घरी आल्या होत्या. माझी एक पत्र्याची पेटीच भरली होती निसर्गचित्रांची , ती चित्रे त्यांनी पाहिली व मला आर्टस्कूलची माहीती दिली व प्रोत्साहन दिले. त्यानंतर मात्र चित्रकला कॉलेजला जाण्याचे मी मनोमन नक्की केले.
1985 साली एके दिवशी मी घरातून बारावी सायन्स पूर्ण करून कोल्हापूरला पळून आलो. तेथे एक वर्ष मी फौंडेशनचा कोर्स पूर्ण केला व नंतर पुण्याला आलो.
कोल्हापूरला निसर्गचित्रांची एक परंपरा आहे . त्यामुळे मी तोच निसर्गचित्रांचा ध्यास सातत्याने ठेवला. पुण्यात आल्यानंतर मी कमर्शियल आर्ट शिकण्याचा निर्णय घेतला , सुट्टीमध्ये ज्यावेळी मी पाचगणीला जायचो त्यावेळी मी पेसी अंकलच्या बंगल्यावर हमखास जायचो आणि बंगल्याच्या सभोवतालची , पाचगणी परिसराची खूप निसर्ग चित्रे रेखाटायचो. अंकल ती चित्रे पाहून खूप खुष व्हायचे ……
त्यांनी मला एक कल्पना सांगितली. मी पाचगणी परिसरातील सर्व निसर्गचित्रे काढायची आणि ती त्यांच्याकडे विकायला द्यायची, विकलेल्या चित्रांचे जे काय पैसे होतील ते सर्व पैसे मला देण्यात येतील शिक्षणासाठी त्याचा मला उपयोग होईल आणि कोणत्याही प्रकारचे कमिशन पेसी अंकल घेणार नाहीत. परंतु चित्रे खूप स्वस्तात असली पाहीजेत. ही कल्पना मी ताबडतोब मान्य केली कारण मला कमर्शियल आर्टच्या शिक्षणासाठी व पुण्यामध्ये वसतिगृहात राहण्यासाठी खर्च येत असे.
☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ मला भेटलेली एक सुंदर स्त्री !!☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆
एका संध्याकाळी सगळी कामं आटोपून मंदिराबाहेरील एका आडबाजूच्या बाकड्यावर बसलो होतो, अंधार पडत चालला होता, वर्दळही फारशी नव्हती. घरी जायच्या आधी कोणाचे काही कॉल्स, व्हॉट्स अप बघावं म्हणून मोबाईल काढला…. बघतो तो हँग झालेला… बापरे.. बरेच महत्त्वाचे कॉल्स आता कसे करायचे? मोबाईल चालू करण्याचा खटाटोप चालू झाला… वैताग आला… मोबाईल काही सुरु होईना ….
काय करावं या विचारांच्या तंद्रीत असतांनाच खांद्यावर कुणीतरी हात ठेवला आणि घोगऱ्या आवाजात कुणीतरी विचारलं, ‘ कोण हाय …? ‘ मी तंद्रीतुन जागा होत एकदम दचकलो आणि वर पाहिलं तर बघून भिती वाटावी अशा विचित्र चेहऱ्याची एक बाई शेजारी उभी….
आधी घाबरलो पण नंतर चिडून विचारलं , “ काय बाई ही काय पद्धत आहे का ? दिसतंय का नाही तुला ? फटकन येऊन अशी अंगावर हात ठेवतेस … घाबरलो ना मी…! “
तशी म्हणाली, “ आवो मला दिसत नाय, हितंच मी भायेर भीक मागती. या टायमाला मी हितंच बसून भाकर खाती… मापी करा, मी जाती दुसरीकडं … “ मी ओशाळलो, म्हटलं, “ नाही बाई बसा इथंच , मी चाललोच आहे… “
तिला बघून अंगातला डॉक्टर जागा झाला, म्हणालो “ डोळे कशानं गेले?” म्हणाली,” लहानपणी डोळ्यातनं पाणी येत व्हतं. लइ दुकायचे डोळे, आयबापानं गावातल्या भगताला दाखवलं, त्यांनं कायतरी औशद सोडलं डोळ्यात , मरणाची आग झाली. नंतर डाक्टर म्हणला कसलंतरी अॕशीड व्हतं ते, डोळं आतुन जळल्यात , तवापासुन दिसणंच बंद झालं, १७ वर्साची व्हते मी तवा…. “
“ अरेरे ! तुमच्या आईबापाच्या आणि भगताच्या चुकीमुळं डोळे गेले तुमचे. आधीच ते डॉक्टरांकडे गेले असते तर ही वेळ नसती आली… बेअक्कल असतात लोकं…” मी सहज बोलुन गेलो.
यावर मला वाटलं माझ्याच सुरात सूर मिसळून ती आता त्यांना शिव्या शाप देईल. पण नाही.. ती म्हणाली, “ नाय वो, कुनाच्या आयबापाला वाटंल आपल्या तरण्या पोरीचं डोळं जावं म्हणुन ? बिचाऱ्यानी त्यांना जे जमलं ते केलं… खेड्यात कुटनं आनायचा डाक्टर ? आणी आला तरी त्याला पैसं कुटनं दिलं आस्त ? माजं डोळं गेल्यावर डोकं आपटून आपटून माजा बाप गेला …त्या बिचाऱ्याची काय चुक व्हती? माज्या आईनं, एकाद्या लहान बाळावानी माजं सगळं केलं… डोळं आसताना जेवडी माया नाय केली त्याच्यापेक्षा जास्त माया तीनं डोळं गेल्यावर केली.. मी चांगली आसते तर येवडी फुलावानी जपली आसती का मला ? डोळं गेल्याचा आसाबी फायदा आसतुया … “ ती हसत म्हणाली…
…. वाईटातून सुद्धा किती चांगलं शोधण्याचा प्रयत्न करत होती ही बाई ?
तरी मी म्हणालो, “ मग भगताचं काय … ? त्यांनं तर चुकीचं औषध सोडलं ना ? “
म्हणाली, “ आसं कसं म्हणता सायेब, माजं डोळं काय मुद्दाम घालवलं का त्यानं ? आवो मला ते औशद लागु न्हाई झालं त्याला त्यो तरी काय करणार ? आवो माजं डोळं जाणारंच होतं, त्याला त्यो निमित्त झाला फक्त … माज्या नशीबाचे भोग हुते ते … त्या बिचाऱ्याचा दोष न्हाई… कुणी काही चांगलं करायला गेलं आन चुकुन वाईट झालं तर त्याला दोष देवु नाई… ! डाक्टर सुई टोचतो, पण बरं वाटावं म्हणूनच ना? त्याचा दुखवायचा इचार नसतो त्यात… आपुन आसं समजुन घेतलं तर कुणाचा राग कशाला येईल…?”
‘ Intention is important behind every action ‘ ..
.. या वाक्याचं सार या बाईने किती सहज सांगितले …!!!
“ पण आज्जी इतकी वर्षे तुम्ही काहीही न बघता कशा राहू शकला? “
म्हणाली, “ न बघता? काय बघायचं राहिलंय … आवो सगळं बगुन मनात साटवलंय …. वासराला दुध पाजताना गाईचं डोळं म्या पाहिलेत, सगळा भात माज्या ताटात टाकुन उपाशी हासत झोपणारी आई म्या पाह्यलीय, पिल्लाच्या चोचीत घास भरवणारी चिमणी म्या बगीतली, कुत्र्याच्या पिल्लाला दुध पाजणारी शेळी म्या बगीतली, फुटलेल्या छपरातनं आत येणारं चांदणं म्या बगीतलंय, मातीतनं उगवणारा कोंब म्या पाह्यलाय …. तुमी काय बगीतलं ह्यातलं …? आवो ह्ये सगळं बगुन झाल्यावर राह्यलंच काय बगायला ? “
…… तिच्या प्रश्नाला उत्तर नव्हतं माझ्याकडे !
“ आज्जी तुमचं लग्न ….? “ मी चाचरत विचारलं… आज्जी म्हणाली, “ झालं हुतं की, त्यो बी आंदळा हुता, त्यानंच आणलं पुण्याला मला …. पदरात एक पोरगी टाकली. त्याच्या पुण्याईनं पोरगी आंदळी नव्हती … म्हणलं चला चांगलं दिवस आलं … पन त्योबी दोन वर्षातच गेला…… बरं झालं बिचारा त्यो तरी सुटला…. ! “
“ आणि आज्जी तुमची पोरगी ? ती कुठाय ? “ आज्जी भकास हसली, म्हणाली,” तिच्या विसाव्या वर्षी ती गेली तिच्या बापामागं त्याला शोधायला … आता दोगं वरनं माजी मजा बगत आसतील …. स्वर्गात म्हणं नाच-गाणी चालत्यात रोज, पन आमच्या आंदळ्याच्या नशीबात ते बी न्हाई मेल्यावर सुदा…..” असं म्हणून आज्जी हसायला लागली…
…. पण मी सुन्न झालो, काय बोलावं हेच कळेना…. इतकं सगळं भोगूनही ही इतकी निर्विकार !
“ आज्जी, या सगळ्यात दोष कुणाचा पण ? “
“ कुणाचाच न्हाई. परत्येकानं आपापलं काम केलं, ज्याचा त्याचा मोबदला ज्याला त्याला मिळाला… आपल्या वाट्याला आलं ते घ्यायचं, का आन कसं ते इचारायचं न्हाइ… भाकर मिळाली तर म्हणायचं .. आज आपली दिवाळी, ज्या दिवशी मिळणार न्हाई म्हणायचं, चला आज उपास करु….दोष कुनाला द्यायचा न्हाई… वाईटात बी चांगलं शोधलं तर माणसाला वाईट वाटायचं काही कारणच नाही…”
“ ते कसं आज्जी ? मला नाही समजलं …”
“ ह्ये बगा सायेब, एकाद्याचा हात जरी तुटला तरी त्यानं म्हणावं, एकच हात तुटलाय , दुसरा तरी हाय चांगला, दोनी हात गेलं तरी म्हणावं पाय तरी हायेत माजे आजुन… आता माजं बगा, दोनी डोळं गेलं तरी बोलता येतंय ना मला ??? “
.. .. काय बोलावं मलाच कळेना. या विद्रुप चेहऱ्यामागे किती विद्वत्ता दडली होती ? ‘वयामुळं हा पोक्तपणा आला असेल, की भोगलेल्या सर्व यातनांमुळे मनाला आलेला हा बधीरपणा असेल ?’ ….
…… कारण काहीही असो .. एवढ्या सुंदर विचारांची, वाईटातून चांगलंच शोधण्याचा प्रयत्न करणारी, वरवर विचित्र दिसणारी ती आजी तेव्हा मला जगातली सर्वात सुंदर स्त्री भासली !!!
Is fat really the worst thing a human being can be ? लठ्ठ असणं हाच माणसाचा सगळ्यात मोठा दोष असू शकतो का ? हॅरी पॉटर पुस्तकमालेच्या प्रख्यात लेखिका जे के राऊलिंग यांना पडलेला प्रश्न.
आणि या प्रश्नाची आठवण होण्याचं कारण होती शाळेतली आमच्या नववीच्या वर्गात असलेली मोहिनी. ती शब्दशः खात्यापित्या घरची होती, मस्त गुबगुबीत, गोलू गोलू होती. आम्ही सगळे तिला मोहिनी नव्हे तर गोलिनीच म्हणायचो.
वर्गातली, शाळेतली सगळीच मुलं तिला वेगवेगळ्या टोपणनावांनी चिडवायची. एवढंच काय, कधी कधी तर वर्गात शिक्षकही तिच्या वाढत्या वजनाची टिंगल करायचे.
या सगळ्याचा परिणाम म्हणून ती कोशात जात गेली, कोणाशी मिसळत नसे, कोणत्या ॲक्टिविटीत सहभागी होत नसे, ना स्पर्धक म्हणून ना प्रेक्षक म्हणून.
पण यंदा नववीचे वर्ष होते, बहुधा पुढच्या वर्षी मान मोडून अभ्यास करायचा म्हणून असेल, या वर्षी स्नेहसंमेलनात तिनं चक्क वैयक्तिक नृत्य (सोलो डान्स) सादर करणार म्हणून नाव नोंदवलं.
मी स्वतः निवेदक असणार होतो, त्यामुळे सरावापासून ते प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या दिवसापर्यंत मला सगळ्याच गोष्टी जवळून न्याहाळता येणार होत्या.
ज्यांना ज्यांना मोहिनी डान्स करणार आहे हे कळलं ते सगळेच तिने सरावासाठी नोंदवलेल्या वेळी, सगळं कामधाम टाकून तिथे उपस्थित होते.
स्टेजवर लाईट होता, बाकी प्रेक्षागृहात अंधार होता. स्नेहसंमेलनात कार्यक्रम सादर करणारेच प्रेक्षागृहात आपल्या सरावाची पाळी येण्याची वाट पाहत बसले होते.
मोहिनी स्टेजवर आली, त्या प्रखर प्रकाशाला ती adjust होत होती तोवरच अंधारातून आवाज आला, “स्टेजचा विमा उतरवला आहे ना रे ? आज तुटणार ते.”
ती गोरीमोरी झाली.
“नाही रे, त्याच्या आधी ही जाडी अम्माच फुटेल.”
मोहिनीला या कुचेष्टा सहन झाल्या नाहीत, ओक्साबोक्शी रडत, चेहरा ओंजळीत लपवत ती तिथून जी पळून गेली ती परत सरावाला आलीच नाही.
माझ्या दृष्टीने तिच्या सहभागाचा तो the end होता.
प्रत्यक्ष स्नेहसंमेलन आमच्या शहरातील प्रख्यात नाट्यगृहात होते. अगदी बाल्कनीसुद्धा खचाखच भरली होती. विद्यार्थी – पालक सगळेच आले होते. कार्यक्रम सुरू झाले. हशा, टाळ्या, हुर्रे, हुर्यो – सगळं पूर्ण जोशात होतं. आणि माझं लक्ष कार्यक्रम पत्रिकेतील पुढच्या नावाकडे गेलं. चक्क मोहिनीचं नाव होतं. मी चक्रावलो, सरांना म्हटलं, ” सर, ती नंतर कधीच सरावाला आली नाही. ती आज तयारी न करता स्टेजवर आली, तर फार फजिती होईल तिची, सर.”
सर काही उत्तर देणार एवढ्यात चालू असलेला कार्यक्रम संपला आणि दुसऱ्या निवेदकानं मोहिनीचं नाव घोषितसुद्धा केलं.
आणि सरावाच्या वेळचीच पुनरावृत्ती झाली. मोहिनी स्टेजवर येताच प्रेक्षकांत एकच खसखस पिकली. काहींनी उपहासाने टाळ्या वाजवायला सुरुवात केली, हुर्यो उडवायला सुरुवात केली.
मी बारकाईने मोहिनीचं निरीक्षण करत होतो. हे सगळं सुरू झाल्यावर, आजही सुरुवातीला क्षणभर तिचा चेहरा पडला. पण आज ती बावरली नाही, ठामपणे जागेवर उभी राहिली.
लोकांना जेव्हा हे लक्षात आलं की ही पळ काढत नाहीये, तेव्हा आश्चर्याने – अचंब्याने क्षणभर शांतता पसरली, आणि मोहिनीने तोच क्षण नेमका पकडला आणि तिच्या नृत्याला सुरुवात केली.
उडत्या चालीचं एक लोकप्रिय हिंदी गाणं होतं ते, लोकांनी त्यांच्याही नकळत ठेका धरला. मोहिनी लयबद्ध नृत्य करत होती. तिच्या शरीरयष्टीमुळे तो डान्स ती वेगळ्या प्रकारे सादर करत होती पण अतिशय आत्मविश्वासाने पेश होत होती.
सुरुवातीला टर उडवण्यासाठी वाजवल्या गेलेल्या टाळ्यांचं रुपांतर कौतुकाच्या टाळ्यांमध्ये कधी झालं हे प्रेक्षकांनाही कळलं नाही.
Veni, Vidi,Vici – मोठ्ठे युद्ध जिंकल्यावर ज्युलियस सीझर म्हणाला होता, तेच आज मोहिनी म्हणू शकत होती.
ती आली, तिनं पाहिलं आणि ती जिंकली.
आणि हे सोपं नव्हतं. सगळे तिची टर उडवायला टपून बसले आहेत हे तिला ठाऊक होतं. तिलाही आतून भीती वाटत असेलच. तिनं कसून मेहनत घेतली होती आणि खमकेपणाने, खंबीरपणाने सगळ्यांच्या समोर उभी राहिली होती.
तिला इतरांच्या प्रशस्तीपत्रकांची, प्रमाणपत्रांची गरज नव्हती, पण तिचं तिलाच सिद्ध करायचं होतं की आपण हे करू शकतो.
आपल्याच प्रश्नाचं उत्तर देताना जे. के. राऊलिंग म्हणतात, ‘ Is fat worse than being vindictive, jealous, shallow, vain, evil or cruel?’ .. सूडवृत्ती, मत्सर, उथळपणा, गर्विष्ठपणा, दुष्टपणा, क्रूरता – हे सगळे तर लठ्ठपणापेक्षा कितीतरी वाईट आहेत.
आता आमच्या मोहिनीला कोणी गोलिनी म्हणत नाही. आम्ही आता तिला आमची सरोज खान म्हणतो.
सिव्हिल हॉस्पिटल, सांगली येथे 23 वर्षापासून कार्यरत. वाचन,संगीत, विविध कला जोपासणे कविता, ललित लेखन यात विशेष रस. हसणे आणि हसवणे मनापासून आवडत असल्याने विनोदी लेखनाची आवड.
मनमंजुषेतून
☆ – माझी दंत कथा… – ☆ सौ. रेखा दयानंद हिरेमठ ☆
आता तुम्ही म्हणाल ही कसली कथा? दंतकथा म्हणजे पूर्वापार चालत आलेल्या कथा ना ! मग तुझी कसली ही कथा ?…. अहो दंतकथा म्हणजे माझ्या दाताची – मी गमावलेल्या अक्कलदाढेची कथा.
तर काय सांगत होते मी …. आटपाट नगरामध्ये एका स्त्रीचे आयुष्य अगदी सुरळीत चालू होतं. पण अशा या सुरळीत आयुष्यात या स्त्रीच्या म्हणजे माझ्याच हो, दातामध्ये किडीचा प्रादुर्भाव झाला आणि ही दंतकथा उदयास आली. तर झालं असं, रात्री अपरात्री माझ्या दाताने त्याचे अस्तित्व अधोरेखित करायचा चंगच बांधला. एकदा ठणका सुरु झाला की झोपेचं खोबरंच. स्वतः हॉस्पिटलमध्ये काम करत असून देखील इन जनरल कोर्टाची आणि दवाखान्याची पायरी चढायची नाही अशा गैरसमजुतीमुळे मी घरीच दुखऱ्या दाता जवळ मीठ- हळद दाबुन ठेवणे, लंवग धरणे, असे काही-बाही घरगुती उपाय केले. त्याने थोडे दिवस बरे वाटले. पण हे दुखणे काही हटेना. शेवटी खूप सारं मानसिक बळ एकवटून आमची स्वारी दाताच्या दवाखान्याकडे वळली. थोडे दिवस औषधांचा मारा करून मग अक्कलदाढ काढायची असे डॉक्टरांनी सांगितले.
ठरलेल्या दिवशी उसने अवसान आणून मी दवाखान्यात जाऊन बसले. आणि माझा नंबर येण्यासाठी वाट पाहू लागले. हल्ली पूर्वीसारखं वाट पाहणं फार काही बोरिंग असे होत नाही ते मोबाईलबाबांच्या कृपेमुळे. थोडा वेळ मोबाइल चेक केला. पर्समध्ये सुधा मुर्तींचे वाइज अँड अदरवाइज पुस्तक होते. ते थोडे वाचले. पण चैन काही पडेना. शेजारी एक बाई त्यांच्या लहान मुलाला घेऊन बसल्या होता. ते बाळ देखिल एका ठिकाणी बसून कंटाळलं होतं. दिसेल ती वस्तू- गाडीची चावी, आईची ओढणी सर्व काही ते बाळ तोंडात घालत होते आणि त्याची आई शीsss हे तोंडात घालू नको ते तोंडात घालू नको असे उपदेश देत होती. मधूनच ते बाळ माझ्याकडे प्राणीसंग्रहालयामध्ये असलेल्या एखाद्या प्राण्याकडे पहावे तसे पाहत होते. मग मी पण त्याला चुटकी वाजवून खेळवायचा प्रयत्न करू लागले. त्याचे आईच्या अंगावर, सोफ्यावर उड्या मारणे सतत चालू होते. थोड्या वेळाने त्या गोंडस बाळाला झोप आली. म्हणून त्याच्या आईने त्याला झोपवण्यासाठी थोपटणे सुरू केले. आणि आपण लहान मुलांना झोपवताना गुणगुणतो तसे आsss आss गाणे सुरू केले. तसे ते बाळ सुध्दा जोरजोरात आsss आsss असा सूर लावू लागले. नेमके त्याच वेळी माझे लक्ष दुसरीकडे असल्याने त्याच्या त्या मोठ-मोठ्याने आsss आsssकरण्यामुळे मी एकदम दचकून पाहिले. त्या माय-लेकराचं दोघांचं आsss आsss सुरु होते. खरेतर हे पाहून मला खूप हसू फुटले. मी विचारात पडले. नक्की कोण कोणाला झोपवत आहे. मी त्या बापड्या आईला तसे विचारले देखिल. ती पण खुप हसत होती. शेवटी एकदा त्या बाळाला निद्रादेवी प्रसन्न झाली. आणि लेकरू झोपी गेलं. आणि त्याच्या आईने मोठा सुस्कारा सोडला. त्याला झोप आल्यावर तो असेच मोठ-मोठ्याने आsss आsss असं गाणं म्हणतोअसे सांगू लागली.असो काही का असेना त्यामुळे माझा वेळ कसा गेला मला कळालंच नाही.
थोड्या वेळाने त्या बाळाची मोठी बहीण म्हणजे ७-८ वर्षाची गोड मुलगी डॉक्टरांच्या केबिनमधून बाहेर आली. तेव्हा मीच मनाला समजावलं बघ एवढीशी मुलगी देखिल हसत हसत बाहेर आली आहे, मग तू कशाला घाबरतेस. मग झाशीच्या राणीप्रमाणे उत्साहाची वीज अंगात सळसळली आणि मी डॉक्टरांच्या केबिनकडे प्रस्थान केले. डॉक्टर दूरचे का असेनात पण नात्यातीलच असल्यामुळे एक दिलासा होता. थोडफार बोलणे झाल्यानंतर मदतनीसांनी मला त्या खुर्चीत बसायला सांगितले. खरेतर ती खुर्ची इतकी सुंदर आणि आरामदायी होती की त्यावर क्षणात झोप लागावी. पण दुखणाऱ्या दाढेमळे ते आसन म्हणजे अदृश्य काट्याकुट्यांनी व्यापलेलं एखाद्या राज्याचे सिंहासन असल्याचा भास झाला. थोड्या वेळाने डॉक्टर आले. त्यांनी माझ्या दाढेवर लक्ष केंद्रीत केले आणि माझ्या दाढेजवळ स्प्रे, इंजेक्शन वगैरे उपाय योजना सुरू केल्या. इंजेक्शन देताना मात्र कसा कुणास ठाउक मी एकदम हात हलवला. डॉक्टरांनी त्यावेळी मला सौम्य भाषेतच पण सुई टोचेल तुम्ही हलू नका असे सांगीतले. डॉक्टर म्हणाले “ तुम्हाला जेव्हा जडपणा, बधिरपणा जाणवतो तेव्हा सांगा. काही गडबड नाही मात्र आजिबात हलू नका.” मी तशातच मान डोलावली आणि थोड्या वेळाने मी तयार आहे असे सांगीतले. आता मात्र मी माझे दोन्ही हात त्या चेअरच्या आर्म रेस्टवर असे काही घट्ट पकडले की मला घोरपडीची कथाच आठवली.
माझ्याकडून अनुमोदन मिळताच डॉक्टर त्यांच्या चेअरमधून अशा आविर्भावात उठले की आता आर या पार. पांढरी वस्त्र धारण केलेला योध्दा आक्रमणsss म्हणून आता लढायला सज्ज झाल्याचा भास झाला. आतून पुरती भेदरलेली मी माझी हाताची पकड आर्मरेस्टवर आणखीनच घट्ट केली. डॉक्टर म्हणाले,’ शांत रहा आणि उलट्या क्रमाने मनात आकडे मोजा.’ मी आपली मनातल्या मनात श्री स्वामी समर्थ चा जप सुरू केला. आणि माझ्या तोंडात तुंबळ युद्ध सुरू झाले, पण खरी कमाल तर मला भूलीच्या इंजेक्शनची वाटली. हा सारा प्रकार त्या भूलीच्या इंजेक्शनमुळे आपल्याच तोंडात सुरू आहे. असे वाटतच नव्हते. जणू काही माझ्या शेजारी जे बसलेत त्यांचीच दाढ काढणे सुरू आहे.आणि मी ते बघत आहे. मनोमन मी त्या भूलीच्या इंजेक्शनचा शोध लावणाऱ्या थोर विभूतीला साष्टांग दंडवतच घातलं. आणि ति-हाईताप्रमाणे डोळे झाकून या युध्दाची साक्षीदार व्हायचा प्रयत्न करू लागले.
एवढ्यावेळ चुळबुळ करणारी मी शांत आहे त्यामुळे मला झोप लागली की काय असे डॉक्टरांना वाटले असावे. म्हणून की काय, डोळे उघडा- डोळे उघडा असे ते म्हणून लागले. म्हणून डोळे उघडून पाहते तो काय डॉक्टरांनी विजयी मुद्रेने युद्ध समाप्त झाल्याची घोषणा केली व सांगितले.. ‘ झालं. झालं,काढला दात.’ आणि असे म्हणून त्यांनी दाढ काढलेल्या पोकळीमध्ये औषधात भिजवलेला बोळा दाबला आणि तोंड बंद करून बसायला सांगितले. तो कापसाचा बोळा तासभर तसाच तिथे राहू दे आणि तासभर अजिबात बोलू नका असे सांगितले. खरेतर तो कापसाचा बोळा हलू नये म्हणून त्यांनी मला तासभर बोलू नका असा सल्ला दिला हे समजले. पण आज दिवसभर जास्त बोलू नका असे म्हणाल्यावर स्त्री स्वभावधर्मानुसार मी डॉक्टरांबरोबर खूप बोलत होते आणि त्यातून डॉक्टर माझ्या मिस्टरांच्याकडून नात्यातले असल्यामुळे यांनीच डॉक्टरांना हिला दोन दिवस गप्प बसायला सांगा असे सांगितले असावे असा दाट संशय आला. मनात शंकेची पाल चुकचुकली आणि मनातले एसीपी प्रद्युम्न म्हणाले ‘ कुछ तो गडबड है दया..’
जरी आतून किडीने पोखरली होती तरी ती बाहेरून पूर्ण गोलमटोल दिसत होती. माझीच दाढ ती माझ्यासारखीच चांगली बाळसेदार होती. हल्ली काय करतील याचा नेम नाही. आठवण म्हणून नेत असावेत दाढ घरी. म्हणूनच की काय डॉक्टरांनी मला विचारले. ती दाढ हवी आहे का? एवढी दुखरी आठवण कशाला जपा .. म्हणून मी नको म्हणून सांगितले.
मग बऱ्याच सूचनांचं सत्र झाल्यावर मी जाण्यासाठी उठले. त्या दाढेचा एखादा फोटोतरी घ्यावा का म्हणून त्या मदतनीसाना मोबाइल दाखवला आणि विचारले दाठ कुठे आहे? फोटो काढून घेते पण तोपर्यंत त्या निर्विकार चेहऱ्याच्या मदतनिसांनी त्या दाढेला केराची टोपली दाखवली होती.
— अशा रितीने माझी दंत कथा समाप्त झाली.
शेवटी काय कितीही कोपऱ्यात, हिरड्यांच्या कुंपणात लपून का बसलेले असेनात, प्रत्येक दातावर आणि दाढेवर व्यवस्थितपणे दोन वेळा ब्रश फिरवायलाच पाहीजे ही अक्कल मला आली…
आमच्या लग्नानंतर अनेकदा, सुनीलला माझ्यासाठी जीन्सची पँट घ्यावीशी वाटे. मला लांब कुर्ता आणि जीन्समधे पहायला सुनीलला मनापासून आवडे. मला खरेदीला सवड नसल्याने वा, या ना त्या कारणाने ‘जीन्स’ची खरेदी राहून जाई. आमचे ‘मंगलदीप’ चे कार्यक्रम शक्यतो शनिवारी-रविवारी असल्याने, त्यावेळी खरेदीची इच्छाही होत नसे. एरव्ही थोरली बहीण उषाताई अमेरिकेहून आली, की ती माझ्यासाठी बॅगा भरभरून वेगवेगळ्या फॅशनचे, सुंदर सुंदर कपडेच कपडे आणायची. तिला, मला त्या कपड्यांत सजवून पाहताना किती सार्थकता वाटे! मला मात्र क्षणाक्षणाला कपडे बदलून फॅशन परेड करायचा खूप कंटाळा येई! तरी बहिणीचे प्रेम पाहून आनंदही होई!
आमच्या लग्नाच्या एका वाढदिवशी मात्र, सुनीलची ही मनापासूनची इच्छा मी पूर्ण करायची असं ठरवलं. याचं खरं कारणही तसंच होतं. मला दूरदर्शनच्या एका दिवाळी स्पेशल कार्यक्रमात, एका मोठ्या मॉलची गिफ्ट कुपन्स मिळाली होती. तिचा योग्य वेळेत वापर करायचा होता. बऱ्याच वर्षांनी दोघांना वेळ होता आणि खरेदीचा योग आणि मूडही होता.
एरव्ही स्लीम ट्रीम दिसणाऱ्या तरुण मुलींची फिगर पाहून मला हुरहूर वाटे. आपल्याला लग्नापूर्वीसारखं असं होणं, आता अशक्यच वाटे! त्यांच्यासारखी, जणू काही अंगालाच घट्ट शिवल्यासारखी टाईट फिटिंग्सची जीन्स आपण कधीच घालू शकणार नाही. त्यातून व्यायामही करायचा आळस! आणि भरीला तासन् तास संगीताच्या रियाजाचं तसंच शिकवण्याचं बैठं काम ! म्हणजे सर्व आनंदी आनंदच ! असो.
आज त्या मॉलमधे मी आणि सुनील अगदी नवपरिणित दांपत्यासारखे आनंदाने बऱ्याच वर्षांनी, हौसे-मौजेने बागडत खरेदीला गेलो. चार पाच मजले फिर फिर फिरून दागिने, घड्याळं, हिऱ्याच्या अंगठ्या, सर्व काही पाहिलं, पण काही पसंतीस पडेना. बरंच फिरल्यावरही माझ्या आणि सुनीलच्या मापाचे कपडेही काही इथं मिळेनात. तेव्हा म्हटलं, “बहुतेक ह्या मॉलमधे आपल्यापेक्षा बारीक व्यक्तींसाठीच कपडे ठेवले असावेत, किंवा आपण ‘स्पेशल एक्स्ट्रा लार्ज’ या कॅटेगरीत मोडत असू. आपल्याला हवी ती ‘जीन्स’ इथं काही मिळणार नाही.
इतक्यात जीन्स दाखवणाऱ्या सेल्सगर्लने मला ओळखलं, “मॅडम, तुम्ही टीव्हीवर गाता का?” मी होकारार्थी मान हलवल्यावर तिला खूप आनंद झाला. म्हणाली, “माझी आई तुमची खूप मोठी फॅन आहे!” तिनं इतर सहकाऱ्यांना सांगून सगळीकडून भराभर उत्खनन करून, पटापट माझ्या मापाच्या जीन्स शोधून आणवल्या. अजूनही काही बारामतीची फॅन मंडळी भेटली. “अय्या, प्रत्यक्षात कित्ती बारीक दिसताय तुम्ही!” असा प्रत्येक स्त्रीला (उगाच!) भुलवणारा आणि सुखावणारा डायलॉग त्यांनी उच्चारला!
मीही आधीच्या सगळ्या भानगडी विसरून (ट्रायलरूमच्या आरशात पाहिलेलं आपलं अजस्र रूप विसरून!) काही क्षण मनोमन सुखावले…आणि त्यातली एक जीन्स आम्ही पसंत करून घेतलीही!
एवढ्यात एक ठेंगणी-ठुसकी, सामान्य तोंडवळ्याची, सावळ्या वर्णाची स्त्री मला भेटली आणि म्हणाली, “आप पद्मजाजी हैं ना? आप तो मेरी शादी में आयी थीं, मैं धीरज धानकजी की बहू हूँ।”… (धीरजजी माझ्या ‘गीत नया गाता हूँ’, ‘घर नाचले नाचले’ अशा अनेक गाण्यांच्या CD चे संगीत संयोजक. तसेच आर.डी. बर्मन, एस. डी. बर्मन , मदनमोहन, लक्ष्मीकांत – प्यारेलाल अशा अनेक दिग्गजांबरोबर अफलातून संगीत संयोजन करणारे प्रतिभावंत कलाकार! त्यांनीच सर्वप्रथम माझं संगीत ऐकून मला सुरुवातीलाच प्रोत्साहन दिलं होतं. स्वतः नवोन्मेषाचा, चैतन्याचा धबधबा असलेले, आजूबाजूचं वातावरण क्षणात तणावमुक्त करणारे धीरजभाई, जे गाणं हातात घेतल्यावर, त्या गाण्याला सजवून कुठच्या कुठे उंचीवर नेऊन ठेवत! उदा… दिवे लागले रे, आओ फिरसे दिया जलायें… ई.)
इथे धीरजजींच्या सुनेच्या दोन्ही बाजूला एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन सुंदर पिल्लं लगडलेली! “चलो बेटा, नमस्ते करो अंकल आँटी कोऽऽऽ।” असं म्हटल्यावर, नमस्कार करत त्या मुलीनं सुंदर स्मित केलं अन्…. माझ्या डोक्यात अक्षरशः लख्खकन् वीज चमकली!
काय ही दैवाची करणी! साक्षात् धीरजभाईंचं जस्संच्या तस्सं तेजस्वी रूप, कोरल्यासारखं तिच्यात उतरलं होतं ! ‘परमेश्वर’ नावाच्या कोण्या एकाने हे ‘जीन्स’ मात्र अगदी ‘फिट्ट’ बसवले होते! तेच डोळे, तोच वर्ण, तेच हास्य…. परमेश्वराच्या अदाकरीचा – कलाकृतीचा हा नमुना पाहून मात्र, माझ्या डोळ्यांतली आसवं मी थांबवून ठेवली होती.
खरंतर जन्म मरणाचं चक्र भारतीय तत्त्वज्ञानाने अपरिहार्य मानलं आहे. जीव कुडी सोडून जातो. नष्ट होत नाही. पण एका पिंजर्यातून प्राणपक्षी दुसर्या पिंजर्यात जातो. चौऱ्याऐंशी लक्ष योनींमधे प्रवेश करून पुन्हा धरतीवर सजीव प्राण्यांमध्ये येतो. जीन्सच्या रुपाने आज धीरजभाई यांना त्यांच्या या नातीमधे वास करताना मी पाहिलं. प्रत्यक्ष धीरजभाईंचं रूप पाहून आनंद आणि ते या जगात नसल्याची खंत!.. अशी संमिश्र भावना डोळ्यांत दाटून आली होती. मात्र ही मंडळी नजरेआड झाल्यावर माझा बांध मी मोकळा करून दिला…!
☆ आध्यात्मिकतेचा श्रेष्ठ अनुभव – पंढरीची पायी आषाढी वारी 2023 – भाग –5 ☆ श्री सदानंद आंबेकर☆
२७ जून :: झाला जन्म सुफळ– झाले विठ्ठलाचे दर्शन – पंढरपुर : अंतर २२.३१ कि. मी.
आता तो दिवस उजाडला ज्याची प्रतीक्षा मला होती। खूप वर्ष आधी विद्यार्थी जीवनांत पंढरपुरला आलो होतो. पण आजची वेळ एकदम विशिष्ट होती। वारीचा अर्थ आम्हाला पहिल्या दिवशी सांगितला गेला होता, तो म्हणजे ‘ प्रतिकूलतेतून अनुकूलता शोधणे।’ आध्यात्म क्षेत्रात यालाच तितिक्षा, (तपस्या नाही बरं का) असे पण म्हणतात। तर इतके श्रम करून आज देवदर्शन होणार हे खास होते। आज आम्ही भंडीशेगाववरून काल जसे आलो तो मार्ग न धरता, गावकऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे थेट पंढरपुर येईल असा रस्ता धरला। इथे गर्दी पण अजिबात नव्हती अन् सडक पण खूप छान पक्की होती। आसपास उसाची शेते, द्राक्षांचे बगीचे, टयूबवेलची स्वच्छ जलधार हे सगळं बघत सुमारे अकरा वाजता पांडुरंगाच्या नगरीत आलो।
आमच्या वेळापत्रकाप्रमाणे २७ते ३० ता.पर्यंत पंढरपुरला राहता येणार होतं. पण एक दिवसानंतर एकादशी होती. तेव्हा येथे लक्षावधी लोक असतील तर देवाचे दर्शन तर नाहीच, पण कळस दर्शनसुध्दा कठीण होणार होते. म्हणून आम्ही आजच देवळात जायचे ठरवले। यात्रा सूचनांप्रमाणे मला माहिती होते की वारकरी फक्त कळस – दर्शन करतात. पण आज तर कमी गर्दी असल्यामुळे देवळात जाणं शक्य होतं।
शहरात खूप आत जाऊन जेव्हा पहिल्यांदा देवळाच्या नावाचा बोर्ड लांबूनच दिसला तेव्हा माझी जी मनःस्थिति झाली ती शब्दात सांगू नाही शकणार। मला असे वाटले की मी काय करू शकलो। पुण्याहून पंढरपूरपर्यंत पायी – हे सत्य आहे ?????? असं वाटलं की मी काय प्राप्त केलं, काय मी एवरेस्टवर पोहोचलो ? मी हे करू शकलो तर ते कसं इत्यादि !! नंतर आम्ही लांबून जे मुखदर्शन होते ते करायचं ठरवलं कारण प्रत्यक्ष दर्शनाकरिता खूप तास लागतील अशी सूचना मिळाली। सुमारे दीड किमी लांब रांगेत उभे राहिलो. पण हे चांगलं होतं की ती रांग सतत चालत होती. त्यामुळे ठीक एक तासात आम्ही देवळाच्या आत होतो। प्रचंड गर्दीचा दाब असल्यामुळे क्षणार्धात आम्ही तिघांनी दर्शन घेतलं. पण विठ्ठलाच्या देवळात मला शिपायानी जो धक्का मारून बाहेत केलं त्यामुळे पहिल्यांदा मी देव प्रतिमा बघूच शकलो नाही. मग बाहेर आल्यावर माझ्या ताईनी पुन्हा आत जायला सांगितले। दारातून उलटं जाणं फार कठीण होतं. पण देवकृपा झाली, एका सेकंदाकरिता गर्दी एकदम थांबल्यासारखी झाली, दार मोकळे होते. मी पटकन् आत शिरलो आणि देवाचे अगदी मन भरून दर्शन घेतले आणि नंतर रखुमाईच्या देवळांत दर्शन घेतले।
बाहेर आल्यावर प्रसादाच्या वस्तू, आणि लोकांना आठवण म्हणून द्यायला देवप्रतिमा इत्यादि घेतल्या। देवळात आत काहीच नेणं शक्य नाही म्हणून हे सगळं नंतर घ्यावं लागलं। आता मन एकदम तृप्त होते। एक फार मोठं लक्ष्य प्राप्त केलं असा भाव मनात होता।
या नंतर आम्ही आमच्या आजच्या ठिकाणावर गेलो। ही पण एक भली मोठी शाळा होती. तेथे आमच्याशिवाय इतर अनेक दिंडया आल्या होत्या। संध्याकाळ व्हायला लागली होती नि काही वारकरी परतीच्या प्रवासावर निघत होते। आम्ही पण आपलं सामान व्यवस्थित एकत्र जमवून घेतलं, कारण आज रात्री आमची पण मुंबईकरिता गाडी होती। वेळ होती हरिपाठाची, त्याप्रमाणे सौ माईनी हरिपाठ घेतला आणि आता वेळ होती सगळयांशी बिदाई घ्यायची। किती तरी उच्चशिक्षित, उच्च पदस्थ वारकरी आले होते पण त्यांचं दोन हप्त्यांचं हे प्रेम, ती चोवीस तासांची साथ, आता कसं वेगळं व्हायचं ?? भरलेल्या मनानी मी सर्वाना भेटलो, वाटलं आपल्या आप्तजनांपासून लांब होतो आहे। सौ माईसाहेबांनी प्रसाद दिला, दिंडी प्रमुखांचा निरोप घेतला। आमच्या दिंडीत एक गृहस्थ सिडनीहून आले होते. त्यांना भेटलो तर त्यांनी सिडनी ला यावे आणि त्यांच्या घरीच थांबायचं असा प्रेमळ आग्रह केला। इतरांनीसुध्दा आपापल्या गावी यायचे आमंत्रण दिले। दिंडी व्यवस्थापन टीमच्या सर्व बंधुंना भेटून सर्वात शेवटी त्या शाळेला नमस्कार करून आम्ही स्टेशनकडे प्रस्थान केले।
शेवटी :: माझे मनोगत :
या यात्रेत काही गोष्टी मला आढळल्या, त्यांचा उल्लेख येथे करणे म्हणजे निंदा किंवा दोषदर्शन करणे नव्हेच.पण वारीसारख्या पवित्र कार्याच्याबाबतीत यात सुधारणा झाली तर उत्तम। रस्त्यात जिथे-जिथे गावात अन्न-जल आदिचे मोफत वाटप व्हायचे, तिथे दिसणारा प्रचंड कचरा, लोकांनी एक घास खाऊन फेकून दिलेल्या भरलेल्या पत्रावळींची घाण, हा अन्नाचा अनादर, जागोजागी रिकाम्या, अर्ध रिकाम्या पाण्याच्या बाटल्यांचा कचरा, केळाची सालं, हे पाहून वाटायचं की हे सगळं आपण व्यवस्थित नाही करू शकत का ? दुसरे असे की तीर्थयात्रेमधे चालत असतांनासुध्दा तंबाखू आणि बीडी सिगरेटचा प्रचंड वापर… तो टाळू शकत नाही का ?
ज्या मार्गावरून माऊलींची पालखी येत आहे त्यावर सगळीकडे तंबाखूची पिचकारी असावी का? आमच्या दिंडीत सुध्दा मी एका वारकऱ्याला सिगरेटचा वापर करतांना बघितले। निदान दोन हप्ते तरी हे बंद ठेवावे, हे विचारणीय नाही का ? पुढे असे की पूर्ण प्रवासात प्रत्येक गावात मांसाहार आणि परमिट रूम ची सोया असणारी खूप हॉटेल्स दिसली। देवकृपेने मी भारतात खूप यात्रा केल्यात. पण ज्या प्रमाणात इथे ही सामिष हॉटेल दिसली तितकी इतर कुठे नाही दिसली. असं नाही की तिथं मांसाहार किंवा मद्यपान मुळीच होत नाही, पण इथे प्रमाण जास्त दिसलं। आपली संस्कृति तर देवदर्शनाच्या वेळी कांदा लसूण सुध्दा वर्ज्य करते- पण असो, ही प्रत्येकाची खाजगी बाब आहे। मी नुसते जे पाहिले ते व्यक्त केले. आलोचना करण्याचा माझा हेतु अजिबात नाही। क्षमस्व !!
पंढरपूरची आषाढी वारी म्हणजे तीर्थयात्रा, पुण्याईची संधी, सेवा-साधना करायची वेळ, असे मला वाटले। आता पुढल्या वर्षी मला जायला मिळते की नाही हे आज सांगणे कठीण आहे. पण या वेळेचा मधुर स्मृतींचा सुवास जीवनात दरवळत राहणार हे मात्र नक्की। दिंडीमधला तरुण वय ते सत्तर अधिक वर्षाच्या वारकऱ्यांचा स्नेह सतत मला जाणवत राहणार। ज्याला जमेल त्याने एकदा तरी हा अनुभव घ्यावा असा माझा विचार।
मी हे जे लेखन केले ते फक्त यात्रेची विस्तृत माहिती इतरांना मिळावी, आणि आठवणींचा संग्रह असावा याकरिता। लेखन किंचित मोठे झाले आहे, पण हा मोठ्ठा अनुभव कमी शब्दात तरी कसा लिहून होऊ शकणार? माझी मराठी येवढी उत्कृष्ट नाही, कारण मी मराठी असलो तरी, तीन पिढ्यांपासून हिंदी प्रांतातच माझे वास्तव्य झालेले आहे. तरी एक छोटासा प्रयत्न केला आहे तो गोड मानून घ्यावा ही विनंती। वर दिलेले रस्त्यांचे अंतर माझ्या गूगल एप चे आहेत, ते फक्त सांकेतिक मानावे।
वारीच्या पहिल्या दिवशी आळंदीत सौ माईंनी म्हटलेच होते की ‘ही यात्रा म्हणजे ईश्वराची, गुरुची कृपा, आई वडिलांची पुण्याई‘… म्हणून परमपिता विठ्ठल-रखुमाई, सर्व सहवारकरी बंधु भगिनी आणि ‘ संत विचार प्रबोधिनी दिंडी ‘ चे खूप आभार। ईश्वर आपणा सर्वांना खूप प्रसन्न, स्वस्थ आणि सुखी ठेवो ही प्रार्थना।