मराठी साहित्य – मनमंजुषेतून  ☆ अक्कलखातं – खूप मोठं – लेखक : डॉ शिरीष भावे ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले

??

☆ अक्कलखातं – खूप मोठं – लेखक : डॉ शिरीष भावे ☆ डॉ. ज्योती गोडबोले 

इयत्ता सहावीत असताना एके दिवशी मुख्याध्यापक वर्गात आले. “आज मधल्या सुट्टीत सगळ्यांनी शाळेच्या सभागृहात जमा. तुम्हाला आत्तापासून बचतीची सवय लागावी म्हणून बँक ऑफ महाराष्ट्रचे दोन प्रतिनिधी तुम्हाला भेटायला येणार आहेत. नीट ऐकून घ्या ते काय सांगतात ते.”

बँकेचे प्रतिनिधी ठरल्याप्रमाणे आले. त्यांनी लहान मुलांसाठी अल्पबचत योजना म्हणजे काय, त्याचे फायदे वगैरे समजावून सांगितलं. वर्गातल्या माझ्यासकट बहुतेक सगळ्या मुलांनी त्या पुढच्या आठवड्यात आपली बचत खाती उघडली.

त्यानंतरच्या सहा महिन्यात खाऊचे पैसे, कुणी वाढदिवसाला दिलेली भेट या स्वरूपात जमा झालेली रक्कम त्या खात्यात मी भरत राहिलो. माझ्या हिशेबाने खात्यामध्ये 127 रुपये जमा असायला हवे होते. पण प्रत्यक्षात होते 125. लेखनिकाकडे त्या दोन रुपयाबद्दल विचारले असता तो म्हणाला,” नोंदीमध्ये काहीतरी चूक झाली असावी. दोनच तर रुपये कमी आहेत. जाऊ दे.विसरून जा. अक्कलखाती जमा करून टाक ” मला वाटलं बचत खात्याला संलग्न अशा विशेष अक्कलखात्याची सोय पण बँक देते. मी भाबडेपणे विचारलं,” त्या अक्कलखात्यावर किती व्याज देतात” माझा प्रश्न आजूबाजूच्या अनेकांनी ऐकला असावा कारण बँकेत हास्याची एकच लाट उसळली. लेखनिकाची विनोदबुद्धी कुशाग्र होती. तो म्हणाला, “अरे गेले ते. अक्कलखाती जमा म्हणजे झाला तुझा मामा!”

अक्कलखात्याची झालेली माझी ती आयुष्यातली पहिली ओळख. नंतरच्या आयुष्यात या खात्यातली जमा उत्तरोत्तर वाढतच गेली. रेल्वेचे तिकीट वेळेवर रद्द केलं नाही म्हणून झालेलं नुकसान, सहल आयत्यावेळी रद्द झाल्यामुळे हॉटेल बुकिंगमधील बरेचसे पैसे कापून मिळालेला परतावा, शेअर बाजारात केलेल्या गुंतवणुकीत खाल्लेली आपटी, आदल्याच दिवशी नियम बदलल्यामुळे जागेच्या नोंदणी शुल्कामधे झालेली 2 टक्क्यांची भरघोस वाढ वगैरे वगैरे अनेक. सर्व काही अक्कलखाती जमा केलं म्हणून डोकं शाबूत राहीलं.

अक्कलखातं आपल्याला खूप काही शिकवून जातं. विसरणं अथवा विस्मरण हे मानव जातीला मिळालेलं वरदान आहे ही पहिली शिकवण. झालेलं नुकसान वेळीच अक्कलखाती जमा केलं नाही तर फक्त मनस्ताप नशिबी असतो. अतिशय दयाळू असलेलं हे खातं आपल्या पोटात पैशांबरोबर वस्तूंनाही सामावून घेतं. पेनं, रुमाल आणि छत्र्या मी किती अक्कलखाती जमा केल्या असतील याची काही ददातच नाही. ह्या तीनही वस्तूंचे उद्योगधंदे केवळ मानवी स्वभावाच्या विसरणे आणि हरवणे ह्या दोन गुणधर्मांवर जिवंत आहेत.

अक्कलखात्याची व्यापकता विस्तृत असते. आपल्या देशाचं अक्कलखातं तर इतकं मोठं आहे की त्यात इंग्रजांनी केलेली लूट आणि स्वातंत्र्यानंतर जमा झालेली पुंजी एकत्र केली तर आपल्या इतक्याच मोठ्या दुसऱ्या देशाची अर्थव्यवस्था आरामात चालवता येईल. पडलेले पूल, खणलेले रस्ते, आधी बांधून मग पाडून पुन्हा बांधलेले उड्डाणपूल, कागदावर उमटलेल्या आणि खर्च होऊनही प्रत्यक्षात उभ्या न राहिलेल्या असंख्य सरकारी आणि खाजगी योजना …. सर्व काही वर्षानुवर्ष अक्कलखाती जमा. देशाच्या अर्थसंकल्पात त्याची कुठेही नोंद नाही.आपल्या देशबांधवांच्या उदार आणि सहनशील मनाचं सर्वात मोठं प्रतिक.

लहानपणी खेळात पहिला डाव हरला की आम्ही म्हणत असू,” हा डाव देवाला”. गेली दीड-दोन वर्ष जागतिक महामारीमुळे निर्माण झालेलं आर्थिक संकट लक्षात घेता अख्ख्या जगालाच” ही दोन वर्ष देवाला” असं म्हणून अक्कलखाती जमा करावी लागणार.

अक्कलखातं जसं आर्थिक आणि वस्तुरूपदृष्ट्या मोठं असावं लागतं, तसंच भावनांचं अक्कलखातं सहिष्णू असल्याशिवाय आयुष्यात तग धरणं अवघड. शाळा-कॉलेजमध्ये शिक्षकांकडून झालेली कानउघडणी आणि कधी कधी अपमानसुद्धा, भरवशाच्या व्यक्तीकडून झालेली फसवणूक, सामाजिक आणि व्यक्तिगत व्यवहारांमध्ये उडालेले खटके, ओढवलेले दुर्दैवी प्रसंग या सर्वांमधून वेळोवेळी होणारा मानसिक कल्लोळ पचवण्यासाठी भावनिक अक्कलखातं बक्कळ मोठं असावं लागतं. “जाऊ दे, विसरून जा” हे अक्कलखात्याच्या बँकेचं ब्रीदवाक्य आहे.

मागच्या आठवड्यातली गोष्ट. शेअर बाजारात पूर्वी जबरदस्त घाटा सहन केल्यामुळे मी डिमॅट अकाउंट बंद करून टाकलं होतं. एक शेअरमहर्षी सद्हेतूने मला भेटायला आला. डिमॅट अकाउंट पुन्हा उघडून देतो म्हणाला. त्याची थोडी गंमत करावी असा खट्याळ विचार मनात आला. ह्या मार्गाने पुन्हा जायचं नाही असा मी कानाला खडा लावला असल्याने त्याला म्हणालो,” जा, तुझ्या बँकेला विचारून ये. डिमॅट खात्याला जोडून एक अक्कलखातं पण देता का?  देत असतील आणि त्यावर चांगलं व्याज मिळत असेल तर लगेच उघडू.” इंग्रजी भाषेत शिकलेल्या त्या भिडूला “अक्कलखातं” ही संज्ञा माहित असण्याची अजिबात शक्यता नव्हती. निष्पापपणे तो म्हणाला,” चौकशी करतो सर”. नंतर परत त्याचा फोन आला नाही

वर्षातून एकदा मी अक्कलखात्याचं पासबुक मनातच भरतो. स्वतः वेळोवेळी प्रदर्शित केलेल्या अक्कलशून्यतेवर हसून विलक्षण मनोरंजन करून घेण्याचा तो खात्रीशीर मार्ग आहे. स्वतःवर हसलं की खूप मोकळं वाटतं मला. बचत खातं बंद करावं एक वेळ पण अक्कलखातं कधीच नको.

लेखक : डॉ शिरीष भावे

प्रस्तुती : डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ सायकलवाली आई… ☆ सुश्री सुनिता गद्रे ☆

सुश्री सुनिता गद्रे

??

 ☆ सायकलवाली आई ☆ सुश्री सुनिता गद्रे ☆

तिला मी गेली चार वर्षे रोजच पहातेय … ओळख अशी खास नाही पण ‘ ती ‘ साऱ्यांच्या उत्सुकतेचा केंद्रबिंदू! आम्ही सगळ्या आपापल्या मुलांना शाळेत सोडायला- आणायला जाणाऱ्या आई गॅंग मध्ये ‘ ती ‘ एकदम वेगळी … एकमेव सायकलवर येणारी आई.   

आजकाल status symbol म्हणून भारीचे ब्रॅंडेड कपडे घालून सायकल चालविण्याचे फॅड बोकाळले आहे … ही त्यापैकी नव्हे. ‘सायकल चालविणे,’ हा  कदाचित तिचा नाईलाज असावा .  आमच्या स्कूटी किंवा कार मधून येणाऱ्या पोरांना हे अनपेक्षित होत . कुणाकडे गाडी नसते किंवा TV / Fridge नसतो , हे त्यांना पटतच नाही. 

ती सावळी आरस्पानी … आनंद, समाधान ,आत्मविश्वासाने अक्षरशः ओथंबलेली…. साधीशी सिंथेटिक फुलांची साडी असायची . गळ्यात चार मणी, हातात दोनच  काचेच्या बांगड्या.  माझ्या गाडीच्या शेजारीच तिची सायकल पार्क करायची. मागच्या सीटवर तिचा मुलगा …. त्याला सायकलचे कॅरीयर टोचू नये, म्हणून, मस्त मऊ ब्लॅंकेटची घडी घातलेली…. लहान असतांना ती त्याला पाठीशी बांधून आणत असे. 

लेक नीटनेटका … स्वच्छ कपडे … बूटांना पॉलिश…. तो पार वर्गात पोचेपर्यंत ती अनिमिष नेत्रांनी पहात असायची …. जणू त्याचं शाळेत जाणं ती अनुभवतेय … जगतेय.

हळूहळू काहीबाही कळायचं तिच्या बद्दल….! ती पोळ्या करायची लोकांकडे… फारतर दहावी शिकलेली असावी. नवरा हयात होता, की नव्हता, कोण जाणे…? पण,ती तिच्या आईसोबत राहायची असे कळले . RTE ( right to education ) कोट्यातून तिच्या मुलाची admission झालीये एव्हढीच काय ती माहिती मिळाली. 

एकदा माझ्या लेकीचा कुठल्याश्या स्पर्धेत दुसरा क्रमांक आला. तिला मी यथेच्छ झापत असतांना , पार्किंगमध्ये सायकलवालीचा लेक दिसताच माझी कन्यका किंचाळली …” अग तो बघ तो ! तो first आला ना, so मी  second आले …”  आणि मोठ्यांदा भोकाड पसरलं. मी त्याची paper sheet पाहिली … 

मोत्यासारखं सुंदर अक्षर …! अभावितपणे माझ्या लेकीला दाखवत म्हणाले , ” बघ बघ … याला म्हणतात अक्षर ! किती मेहनत घेते मी तुझ्यासाठी .. आणि तू ??? ”  माझे डोळे संताप ओकत होते. 

त्याची आई शांतपणे म्हणाली , ” कुणीतरी दुसरं पहिलं आलंय म्हणून, तुमची लेक दुसरी आल्याचा आनंद तुम्ही गमवताय ना ! ”  ….. सणसणीत चपराक…. मी निरुत्तर. 

मी खोचकपणे विचारलं,  “कोणत्या क्लासला पाठवता याला?”

ती म्हणाली, ” मी घरीच घेते करून मला जमेल तसं… ..! मुलांना नेमकं काय शिकवतात, ते कळायला हवे ना, आपल्याला. ” तेव्हाच कळलं ..  ‘हे रसायन काहीतरी वेगळंच आहे !’

हळूहळू ,तिच्याबद्दल माहिती कधी मिळू लागली, तर कधी मीच मिळवू लागले. ती पाथर्डी गावातून यायची…. सकाळी सात तर संध्याकाळी आठ अश्या एकूण पंधरा घरी पोळ्या करायची. तिने स्वतः एका teacher कडे क्लास लावला होता ..बदल्यात ती त्यांच्या पोळ्यांचे पैसे घेत नसे. मी नतमस्तक झाले. मनोमन तिच्या जिद्दीला आणि मातृत्वाला सलाम केला .

पहिल्या वर्गाचा result होता. ती खूपच आनंदात दिसली. चेहऱ्यावर भाव जणू पाच तोळ्याच्या पाटल्या केल्या असाव्यात .. मी अभिनंदन केले … तेव्हा भरभरून म्हणाली…” टिचरने खूप कौतुक केले  त्याचं ! फार सुंदर पेपर लिहिलेत म्हणाल्या.. फक्त थोडे बोलता येत नाही म्हणाल्या ….  त्याच्याशी घरी इंग्रजीत बोल म्हणाल्या. ”  मी तिचं बोलणं मनापासून ऐकू लागले… 

…” छोट्या गावात वाढले ताई.. वडील लहानपणी गेले … अकरावीत असताना मामाने लग्न लावले… शिकायचं राहूनच गेलं .. फार इच्छा होती हो ! “… डोळ्यातलं पाणी प्रयासाने रोखून म्हणाली… ” आता याची आई म्हणून कुठेच कमी पडणार नाही मी… एका teacher शी बोलणं झालंय ,त्या मला इंग्रजी बोलायला शिकवणार म्हणाल्यात …. बारावीचा फॉर्म भरलाय … उद्या याला मोठा झाल्यावर कमी शिकलेली आई म्हणून लाज वाटायला नको .” म्हणत खळखळून हसली. त्याला आज पोटभर पाणीपुरी खाऊ घालणार असल्याचे सांगून, ती निघाली.

मुलांना रेसचा घोडा समजणारी “रेस कोर्स मम्मा”,  सकाळी सातच्या शाळेलाही मुलांना सोडताना  नुकतीच पार्लरमधून आलेली वाटणारी “मेकअप मम्मा” , दुसऱ्या मुलाच्या जन्मानंतर केवळ बारीक होण्यावर बोलणारी, “फिटनेस मम्मा “, स्वतः पोस्ट ग्रॅज्युएट असूनही, नर्सरीतच मुलांना हजारो रुपयांचे क्लासेस लावून मला कसा याचा अभ्यास घ्यायला वेळ नाही हे सांगणारी “बिझी मम्मा” , किंवा मुले allrounder होण्यासाठी त्यांना मी कशी हिरा बनवून तासते हे सांगणारी ” जोहरी मम्मा ” …..  ह्या आणि अश्याच अनेक मम्मी रोज भेटतात मला………या मम्मी आणि मॉमच्या जंगलात आज खूप दिवसांनी मला एक ” आई ” भेटली. अशी आई ,जी एक स्त्री म्हणून,…. माणूस म्हणून… आणि एक आई म्हणून खूप खंबीर आहे… कणखर आहे….. 

… फारच थोड्या नशीबवान स्त्रिया असतात ,ज्यांना जिजाऊ आणि सावित्रीबाई खऱ्या अर्थाने कळतात…! सायकलवाली आई त्यातलीच एक… 

लेखिका : अज्ञात

संग्राहिका – सुश्री सुनीता गद्रे

माधवनगर सांगली, मो 960 47 25 805.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ कुठेतरी थांबलं पाहिजे !!… अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ.स्मिता पंडित ☆

??

☆ कुठेतरी थांबलं पाहिजे !!… अज्ञात☆ प्रस्तुती – सौ.स्मिता पंडित ☆

ठराविक वयाच्या टप्प्यावर नाही म्हटले तरी…तीच ती घरकामे करून करून,नकोशी वाटू शकतात…. सर्वांनाच नाही लागू पडणार….पण मला तरी वाटत…..कुठे थांबावं हे समजणे आवश्यक….पूर्णपणे नाहीच.. अडीअडचणीला आपण निभावून नेलंच पाहिजे….

पण काही जणींचा अट्टाहास असेच पाहिजे तसेच पाहिजे.माझ्याच हाताला चव…माझे मलाच आवडते…

कामे,घरातील टापटीप मलाच त्यातच  रस वाटतो…. त्यानिमित्ताने व्यायाम होतो….

पण घरासाठी कितीही करा कमीच..पण खरच आपण घरासाठी की घर आपल्यासाठी….किती जीवापाड जपावं….स्वतःला मात्र गुंतवून त्याच त्या कामात कितपत योग्य आहे….स्वतःसाठी जगणे होते का? बरे खूप वर्ष मनलावून कामे केली…कुणी घरातील व्यक्ती शाब्बास,तरी म्हटलेले आठवत नाही…की घरकामासाठी  पुरस्कार पण देण्यात येत नाही….का करावी मनाची ओढाताण का घ्यावं इतके टापटीप , स्वच्छ्ता ह्यांचे वेड…जे मनास पटले नाही तरी करीत राहणार…कधीतरी ह्यावर विचार करण्याची गरज आहे….

काय बाई दोन तीन पोळ्या तर करायच्या म्हणून स्वतःच करतात….तीच ती कामे डोक्यात आज काय स्वयंपाक करायचा…पुन्हा रात्री भाजी काय करायची….

दुसऱ्या कुणाच्या कामाला नावे ठेवणे….काय बाई लगेच भांडी घासली कि हाता सरशी लगेच साफ होऊन जातात…तीच ती कामे त्यातच अडकून पडतात….

कितीतरी अजून जगण्याला वाव द्यायचा असतो इकडे लक्षच नसतं….. सार आयुष्य ह्यातच घालून पुन्हा वर म्हणायचं आता बाई होत नाही,पूर्वीसारखं…. शरीर पण कुरकुर करत असत…मन पण नको म्हणून सांगत असत…..पण सरळ दुर्लक्ष करत करण्याची तयारी दाखवतात….पण कुठेतरी थांबले पाहिजे हे कळतच नाही….मीच राबराब राहते …..माझी कदर नाही कुणाला.तूच कर ना तुझीच कदर….घे मोकळा श्वास कधीतरी….दे सोडून मनातील विचार  माझ्याशिवाय घराचे कसे होईल……मस्त चालत आपण नसलो तरी ,हा विश्वास हवा…..

किती  करणार तीच ती कामे…..नकोच गुंतवून घेऊ ना…केलीत की आतापर्यंत …  तूच वाहिलीस घरकामाची धुरा….. मान नाही का दुखत, दे झुगारून आता तरी…..हो घरकामातून रिक्त…..असेल आर्थिक स्थिती संपन्न तर मोलानी करवून घे ना.की त्यातही मला नाही आवडत बाई.कस ग सोड ना आता हट्ट… 

कर वेगळे हट्ट जगेन तर मस्तच… माझ्यावर नितांत प्रेम करणार…….मस्तच वेगळे काहीतरी जगणार नकोच तीच ती चाकोरी…..म्हण स्वतःला थांब ग बाई आतातरी….

जीवन जगायचं कसं तर भरभरून स्वतःला वेळ राखून ठेवला की मग स्वतः खरच जगलो म्हणून भारी वाटतं…..घरकामे करावीत ज्यांना आवड आहे त्यांनी…पण कामाचे योग्य नियोजन केले की त्यात अडकून न पडता…..अजून बरेचसे आवडीचे जगणे होते….फिरणे….मस्त रमतगमत, मैत्रिणी – त्यांच्यात रमणे….गप्पागोष्टी हक्काचे स्थान मन मोकळे मनमुराद जगणे होते…..

मैत्रिणी जमवणे ती मैत्री जोपासणे, टिकवणे ही सुध्दा कलाच आहे….ती अवगत करून, मस्त जीवन जगण्याचा आनंद मिळतो….मस्त आयोजन, नियोजन केले की स्वतः आनंदी असलो की घरदार पण आनंदी राहणार यात वादच नाही…..चला तर मस्त स्वतःसाठी वेळ राखून ठेवू आणि मस्त आनंदी आनंद घेत राहू….. 

लेखक : अज्ञात

प्रस्तुती : स्मिता पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ताटी लावता आली पाहिजे..! – लेखक : श्री प्रवीण ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆

? मनमंजुषेतून ?

☆ ताटी लावता आली पाहिजे..! ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆ 

प्रत्येकाला हे करता आलं पाहिजे. स्वतःला आतून काहीकाळ तरी बंद करून घेता आलं पाहिजे.

मनाला आतून थांबवायचं.! विचारांना आतून थांबवायचं..! चक्क कडी घालायची..!

— विरक्तपणाची कडी..! माउलींना हे सहज शक्य झालं..! कारण त्यांनी विचारांची झेप  त्यांच्या नियंत्रणात ठेवली होती.

 

आपलं तसं नाही.– आपल्याला स्वतःला आवरणं अवघड आहे.– पण जमलं पाहिजे.

समाजाला काही काळ नाकारता आल पाहिजे.— नात्यांना काही काळ लांब ठेवता आल पाहिजे.

अगदी तो विश्वंभरही शक्य तेवढा बाजूला ठेवावा.– श्वास सुद्धा सखा नाही याची जाणीव व्हावी.

— ताटी लावून घ्यावी..!

 

कुणाशी वैर नाही..– दुस्वास नाही..

स्पर्धा नाही..— पण अंतर ठेवावं.!

ताटी घट्ट करावी..!

 

ताटीबाहेरच्या जगाला त्यांच्याप्रमाणे वागू द्यावं.!

तो कोलाहल, त्या हाका ऐकूनही न ऐकल्यासारख्या कराव्या.

आणि आतल्या आत्मारामाचा आक्रोश ऐकावा.! आतली हाक समजून घ्यावी.

— आणि स्वतःला समजावून द्यावी.!

 

— न जाणो ती हाक जेव्हा आपल्याला कळेल, तेव्हा आपल्या आयुष्यात ही मुक्ताई आपल्या झोपडी बाहेर अवतरेल..!

ताटीची गरजच पडणार नाही.— तीच हाका देईल..! जोहार मांडेल..!

अशा वेळी ताटी उघडून तिच्या कुशीत जाणं म्हणजे आयुष्याचं सार्थक..! हे झालं पाहिजे.

या जन्मात नाहीतर पुढच्या जन्मी..! पण केव्हातरी..—– 

— ताटी लावता आली पाहिजे..!!!!

लेखक : श्री प्रवीण 

संग्राहक : श्री अनंत केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “दिल खुलास दाद…” लेखिका – सौ.अंजली औटी ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? मनमंजुषेतून ?

☆ “दिल खुलास दाद…” लेखिका – सौ.अंजली औटी ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

संध्याकाळी पाच साडेपाचची वेळ. मुंबईहून नाशिकला येतांना जो टोलनाका आहे त्यावर गाड्यांची गर्दी होती. या टोलनाक्यावर काही तृतीयपंथी येणाऱ्या-जाणाऱ्या गाड्यांपाशी थांबून पैसे मागत असतात. गाडीच्या काचा बंदच असतात बहुतेकांच्या. ज्यांच्या उघड्या असतात त्यांच्याकडे ही मंडळी थांबतात. 

त्या दिवशी टोलनाक्यावर गर्दी आणि हे पैसे मागणारे तृतीयपंथी. मी बघत होते..शेजारीच असणाऱ्या गाडीच्या मागच्या सीटवर एक सुंदर तरुण मुलगी एकटीच बसली होती..काहीतरी वाचत असावी. तिचं लक्ष बाहेर नव्हतं, म्हणून इतर लोकं ज्यावेळी त्यांना बघून पटापट आपल्या गाडीच्या काचा बंद करत होते पण ती मात्र या सगळ्यापासून आपल्याच विश्वात गुंग होती..

एक हिरवी साडी नेसलेला तृतीयपंथी त्या गाडीच्या जवळ गेला..तिथेच एक गजरेवाला होता..त्याच्यापाशी थांबून त्याने  टपोऱ्या  मोगऱ्याच्या फुलांचा भरगच्च गजरा घेतला..खरंतर गजरा घ्यावा असे मलाही वाटले होते.  पण ‘त्याच्या’ समोर पूर्ण काच खाली करायला नको म्हणून जराशी काच खाली करून निदान फुलांचा वास तरी आपल्यापर्यंत पोहोचतोय का ते बघत होते. 

गजरा घेऊन तो त्या मुलीच्या दिशेने वळला आणि तितक्यात त्या मुलीचे त्याच्याकडे लक्ष गेले..

तिचं देखणं रूप आणि अचानक झालेली नजरानजर…. त्याने एकदम तिला विचारले..” हे अनारकली…, किधर चली..?”

एक सेकंदही वेळ न लावता ती मुलगी तितक्याच मिश्किलपणे पटकन त्याला म्हणाली..” डिस्को चली..!!!”

त्या दोघांच्याही चेहऱ्यावर एकदम हसू..अचानक आलेल्या या उत्तराने तो क्षणभर चपापला..त्याला अनपेक्षितच होते तिचे उत्तर..त्यालाच काय मलाही हसू आले ऐकून..खूप मनापासून..एकदम गंमत वाटली तिच्या या उत्तराची.

तो इतका इतका खुश झाला की त्याने सेकंदाचाही वेळ न लावता आपल्या हातातला मोगऱ्याच्या फुलांचा ओंजळभर गजरा तिला देण्यासाठी हात पुढे केला..एक क्षणभर तिच्या चेहऱ्यावर तो घेऊ की नको असे भाव आले..पण क्षणभरच… तिनेही तो गजरा दोन्ही हातांच्या ओंजळीत घेतला..तिची गाडी पुढे सरकली..

त्याने दुरूनच तिला म्हटले “ऐसेही खुश रहो बेटा..!” आणि तो दुसऱ्या गाडीकडे वळला..

माझ्या समोर नुकत्याच आणि अचानक घडलेल्या त्या घटनेचा अनुभव माझ्यासाठी इतका सुंदर होता की मी नखशिखांत थरथरून गेले ! 

एका हजरजबाबी उत्तराला इतकी दिलखुलास दाद मनापासून देणारा ‘तो’ आणि त्याला एक ‘माणूस’ म्हणून समजून घेणारी ‘ती’… मला त्या वेळेला जगातली अत्यंत सुंदर माणसं वाटली..

आपले किती गैरसमज आणि पूर्वग्रह असतात तृतीयपंथीय लोकांसाठी..पण माणसाची वृत्ती काही लिंगभेदावर अवलंबून नसते. मन सुंदर हवं..जे त्या हिरव्या साडीतल्या व्यक्तीचं होतं..नुसतं सुंदरच नाही तर दिलदार आणि रसिक सुद्धा ! — आणि त्या सुंदर मुलीचे मनदेखील अत्यंत सुंदर आणि पूर्वग्रह विरहित स्वच्छ होते..

छोट्याशा क्षणात घडलेल्या त्या  माणुसकीच्या आणि कलात्म रसिकतेच्या  मनोज्ञ दर्शनाने माझ्या मनातली जळमटं कायमसाठी स्वच्छ पुसली गेली आणि आजही माझ्यासाठी ती आठवण एक सगळ्यात सुंदर आठवण आहे !

लेखिका : डॉ. अंजली औटी.

(#कॅलिडोस्कोप )

प्रस्तुती : सुश्री मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “रुजणे…” – सुश्री प्रिया कोल्हापुरे ☆ प्रस्तुती – सुश्री माधुरी परांजपे ☆

? मनमंजुषेतून ?

☆ “रुजणे…” – सुश्री प्रिया कोल्हापुरे ☆ प्रस्तुती – सुश्री माधुरी परांजपे ☆

चार दिवसांपूर्वी झाडांची माती बदलण्यासाठी वेळ काढला. सगळी झाडं झाली, एक वेल राहिला- गोकर्णचा. त्याला फुलं कमी यायला लागलेली,  पण वेल काढायचा म्हणजे रिस्कच. त्यात एकाच कुंडीत पाच बिया लावून त्या एकाच दोऱ्याने वर गेलेल्या. एकात एक गुंतलेल्या पाच वेलींना बाहेर काढून परत मातीत रुजवायचं म्हणजे दिव्यच वाटलं. फुलं नाही दिली तरी जिव्हाळा जमला होता त्यांच्यासोबत. काढून परत लावल्याने त्या वेली जगतील की नाही समजत नव्हतं. रिस्क घेतली आणि बदलली माती.

संध्याकाळपर्यंत वेल सुकल्यासारखी झाली. जीव झुरझुरला. सकाळी उठल्या उठल्या वेलीकडे गेले. बघितलं तर वेल पूर्ण सुकला, जीव गेल्यासारखा वाकला होता. खूप वाईट वाटलं.पण पाणी घालत राहिले, आणि आज चार दिवसांनी त्याच्यात हिरवेपण दिसू लागलं.

त्यावरून असं वाटलं की आपण बायका पण त्या झाडासारख्याच असतो .काही वेलीसारख्या नाजूक,  तर काही डेरेदार – काही रुक्ष, तर काही अल्लड, सुबक, सुंदर – काही नुसताच दिखावा, तर काही दिसायला बेढब पण उपयुक्त – काही लाजऱ्या -बुजऱ्या, तर काही स्वतःच्या अस्तित्वाने आकर्षित करणाऱ्या – काही बोचऱ्या तर काही मुलायम. 

आपणही लहानपणी माहेरी रुजतो, फुलतो, बहरतो. लग्नानंतर आपली पाळेमुळे उखडून दुसऱ्या ठिकाणी आपल्याला रुजवलं जातं. आपणही या वेलीसारखं थोडं सुकतो, बिचकतो ,नवीन बदल पचवतो आणि आपली मुळे रोवायला सुरुवात करतो, बहरायला लागतो.  तिथं आपल्याला खत,पाणी, वातावरण कसं मिळतं त्यावर प्रत्येकीचं बहरणं वेगवेगळे होतं. काहींना खूप खत, पाणी, काळजी मिळते, त्या खूप बहरतात, फुलतात. काहींना मिळतं पाणी खत, पण त्या दुर्लक्षित असतात. अशावेळी त्या फक्त वाढतात.  पण फुलण्याची, बहरण्याची उमेद नसते.  त्या स्वतःला हरवून बसतात. काहींना काहीच मिळत नाही.  त्या हळूहळू एक एक पान गळून गळून जातात.

असे हे झाडांशी बाईपण जुळतं- 

लेखक : सुश्री प्रिया कोल्हापुरे 

मो. -9762154497

संग्रहिका – सुश्री माधुरी परांजपे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी सुट्टी… ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

??

☆ माझी सुट्टी… ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

खूप दिवसांपूर्वीची गोष्ट. दिवस कुठले, वर्षे लोटली. म्हणजे वीस – पंचवीस वर्षे सहज. आणि गोष्ट म्हणजे काय, तर हकीकत. त्यावेळी मी डी. एड. कॉलेज सांगलीमधे अध्यापन करत होते. मला शिकवायला आवडायचं आणि मुलींमध्ये रमायलाही. तेवढंच तरुण झाल्यासारखं वाटायचं. म्हणजे जॉब सटिस्फॅक्शन वगैरे म्हणतात न, ते होतं, पण तरीही दिवाळी आणि मे महिन्याच्या सुट्टीचे वेध लागायचेच. तेव्हा सुट्टी लागली, की मी यंव करीन अन् त्यव करीन असे मांडे मनात भाजत आणि खात रहायची. त्यातले काही मांडे असे —

पहाटे लवकर उठून व्यायाम आणि प्राणायाम करणे. सकाळी फिरायला जाणे. हे अगदी मस्टच, मी ठरवलं. सुट्टी असल्यामुळे सगळं आही आरामात आवरायचं, दुपारी पंख्याखाली अडवारायचं आणि मनसोक्त दिवाळी अंक किंवा पुस्तकं वाचायची. संध्याकाळी शेजारणी, सख्या- मैत्रिणी यांच्याकडे जाऊन गप्पांचे फड उठवणे, हाही आखलेला बेत असे. एरवी कॉलेजमधून घरी येताना नजरेच्या टप्प्यात जेवढ्या येतील, त्यांना ‘काय कसं काय?’ विचारणं आणि ‘ठीकय. ’ ऐकणं, या पलीकडे संवादाची मजल जात नसे.

 पहाटे उठण्यासाठी गजर लागे. आधी घड्याळाचा, नंतरच्या काळात मोबाईलचा. गजर झाला की मनात येई, लवकर उठणं नि नंतरची लगबग नेहमीचीच आहे मेली. आज आरामात पांघरूणात गुरफटून पडून राहण्याचं सुख अनुभवू या. उद्यापासून सुरुवात करू. पण तो उद्या कधी उजाडत नसे. तो ‘आज’ होऊनच उगवे. व्यायाम, प्राणायाम, पक्ष्यांची किलबिल हे सगळं राहूनच जायचं. नाही तरी किलबिल ऐकायला आता शहरात पक्षी राहिलेतच कुठे, मी मनाशी म्हणे. मला आणि मुलांना सुट्टी असे, पण यांना ऑफीस असल्यामुळे यांचा डबा साडे नऊला तयार असणं गरजेचं असे. त्यामुळे सकाळची कामाची धांदल नेहमीसाराखीच करावी लागे, सुट्टी असूनसुद्धा. माझ्याप्रमाणे मुलांनीही सुट्टीचे कार्यक्रम ठरवलेले असायचे. पोर्चमध्ये उभे राहून गप्पा, किंवा मोबाईलवर चॅटिंग, यू ट्यूबवरचे सिनेमे बघणे, घरात पसारे करणे, त्यांच्या सवडीने जेवायला येणे, आई घरात आहे, म्हंटल्यावर आईनेच जेवायला वाढणे, अपेक्षित. त्यातून बाहेर पडले की माझे लक्ष, कपड्यांनी, भांड्यांनी, पुस्तकांनी ओसंडून वहाणार्‍या कपाटांकडे जाई॰ दिवाळीसारखा महत्वाचा सण. घर स्वच्छ, नीटनेटकं नको, असं मला आणि मलाच फक्त वाटे. घरातल्या इतर कुणाला नाही. ही आवरा-सावर होईपर्यंत दिवाळीचे पदार्थ करायचीच वेळ येई. पणत्या, वाती, उटणं, नवा साबण किती म्हणून तयारी करावी लागायची. दिवाळीच्या दिवसात रोज एक नवीन पक्वान्न हवंच. ‘तुझं गोड नको बाई, काही तरी चमचमीत कर’, अशी मुलांची मागणी. मागणी तसा पुरवठा करायलाच हवा ना, शेवटी आपलीच मुलं. जेवणं- मागचं आवरणं. दुपारचे सहज तीन वाजून जात. मग एखादा दिवाळी अंक घेऊन फॅनखाली पडावं, तर डोळे मिटू मिटू होत. मासिकातील अक्षरे पुसट होत जात आणि मासिक हातातून कधी गळून पडे, कळतच नसे. नाही म्हणायला, संध्याकाळी शेजारणी, सख्या- मैत्रिणी यांच्याकडे जाऊन गप्पांचे फड उठवणे, हा आखलेला बेत बराचसा तडीला जाई.

 दिवाळी येई-जाई. कॉलेज पुन्हा सुरू होई. दिवस- महिने संपत. मार्च उगवे. पोर्शन शिकवून संपलेला असे आणि आता पुन्हा मोठ्या सुट्टीचे वेध लागत. आता मांडे मनात नाही, ताटात घेऊन खायचे, मी नक्की ठरवते. वाटतं, सुट्टीत कुठेतरी फिरून यावं. नवा प्रदेश पहावा. निसर्गाच्या सहवासात काही काळ घालवावा. ताजंतवान होऊन, नवी ऊर्जा घेऊन परत यावं आणि नव्या दमाने, नव्या उत्साहाने नेहमीच्या दिनचर्येला सुरुवात करावी. पण या महिन्यातल्या क्लासचे, परीक्षांचे मुलांचे वेळापत्रक, कधी कुणाचे आजारपण, घरातली, जवळच्या नात्यातील लग्ने या गोष्टी अ‍ॅडजेस्ट करता करता ट्रीपचं वेळापत्रक कोलमडून जाई. दिवाळी काय किंवा उन्हाळी सुट्टी काय, दरवर्षी थोड्या-फार फरकाने असंच काही-बाही होत राहिलं.

 दिवस- महिने- वर्षे सरत आली. माझ्यासाठी कॉलेजची शेवटची घंटा वाजण्याची वेळ आली. एकीकडे कासावीस होत असतानाच मी मनाला समजावू लागले,

 आता मला सुट्टी मिळणार मिळणार

 खूप खूप मज्जा मी करणार करणार.

 आता मला खरंच सुट्टी मिळाली आहे. आता आरामात उठायला हरकत नाही. आता साडे नऊच्या डब्याची घाई नाही. मुलांची जबाबदारी पण आता उरलेली नाही. ती आपापल्या नोकरीच्या गावी, आपआपल्या संसारात, मुलाबाळात रमली आहेत. सकाळी आता उशिरा, आरामात उठायचं. मी निश्चय करते. पण काय करू? जागच लवकार येते आणि एकदा जाग आल्यावर नुसतंच आंथरूणावर पडून रहावत नाही. पूर्वी पाहिलेली स्वप्ने आता आळोखे- पिळोखे देत जागी होऊ लागली.

 आता सकाळी जाग आल्यावर उहून फिरायला जायचं मी ठरवलं. उत्साहाने जिना उतरू लागले, तर गुढगे आणि कंबर म्हणाली, ‘बाई ग, आता आमचा छळ थांबव!’ कमरेला चुचकारत नवा महागडा कंबरपट्टा आणून तिला नटवलं. गुढग्यांवरही छान उबदार वेष्टण चढवलं. पण त्यांचं तोंड वाकडंच. ते काही बेटे सहकार्य करेनात. शेवटी डॉक्टरांशी बोलले. डॉक्टरांनी क्ष-किरण फोटो काढला. फोटो बघत ते म्हणाले, ‘ आता या गुढग्यांना निरोप द्या काकू! आता नवे गुढगे आणा!’ तसे केले. नवे गुढगे घेऊन आले पण चालताना, इतकंच काय, बसताना, झोपतानाही पायाला वेदना होऊ लागल्या. पुन्हा डॉक्टर. पुन्हा क्ष-किरण फोटो. डॉक्टर म्हणाले, ‘ पाठीच्या कण्याच्या चौथ्या – पाचव्या मणक्यांनी गळामिठी घातलीय, ती सोडवायला हवी. ती सोडवली. मग मात्र माझे पाय वेदनारहित झाले. हळू हळू फिरणं वगैरे जमू लागलं. पण डॉक्टरांनी बजावलं, ‘आता चालताना हातात काठी घ्या. ’ आणि एक लोढणं गळ्यात नव्हे हातात आलं.

 आता टी. व्ही. बाघायला वेळच वेळ होता. पण हळू हळू लक्षात येत गेलं, आपल्याला सिरियल्समधले संवाद नीट ऐकू येत नाहीयेत. टी. व्ही. च्या जरी जवळ बसलं, तरी फारसा उपयोग होत नाहीये. कानांकडे तशी तक्रार केली, तर ते म्हणाले, ‘आम्हाला गळामिठी घालायला एक सखा आण. त्याचे लाड-कोड पुरवले. पण त्यांचा हा सखा इतका नाठाळ निघाला, सगळा गलकाच ऐकवू लागला. नको ते आवाज मोठ्या प्रमाणात घुमवू लागला. हवे ते दडवून ठेवू लागला. थोडक्यात, हा कांनांचा सखा, असून अडचण अन नसून खोळंबा झाला. शेवटी मूकपट पाहून नाही का आपण आनंद घेत, तसाच टी. व्ही. बाघायचा, असं ठरवून टाकलं.

 आता वाचायला खूप वेळ होता. चांगली पुस्तकेही हाताशी होती. पण—-

इथेही पण आलाच. निवृत्तीपूर्वीच डोळ्यांवर डोळे चढवून झाले होते. ते साथही चांगली देत होते. पण बालहट्टाप्रमाणे त्याचे काही हट्ट पुरवावे लागायचे. बसून वाचायाचं. झोपून वाचायाचं नाही. तसं वाचलंच तर उताणं झोपायचं कुशीवर नाही. हे हट्ट पुरवल्यावर त्याची काही तक्रार नसायची. पण तो डोळयांवरचा डोळा जरी चांगलं काम करत असला, तरी मूळ डोळा अधून मधून म्हणायला लागला, ‘आता मी शिणलो. आता पुरे कर तुझं वाचन!’ मी नाहीच ऐकलं, तर तो सारखी उघड –मीट करत स्वत:ला मिटूनच घ्यायचा.

 तर असं हे माझं सुट्टीपुराण. . . . . जेव्हा दात होते, तेव्हा चणे नव्हते. आता भरपूर चणे आहेत, तर खायला दातच नाहीत.

© श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क -17 16/2 ‘गायत्री’ प्लॉट नं. 12, वसंत दादा साखर कामगारभावन के पास , सांगली 416416 महाराष्ट्र

मो. 9403310170, email-id – [email protected] 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मला भेटलेली माणसे… ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

सुश्री विभावरी कुलकर्णी

??

☆ मला भेटलेली माणसे… ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

आपल्याला आयुष्यात खूप माणसे भेटतात. आणि कायमच्या आठवणी देऊन जातात. आज सहज एक कार्यक्रम बघताना एक जुनी आठवण जागी झाली. कारण म्हणजे तो कार्यक्रम सादर करणारा आपल्या सर्वांचा लाडका उत्साहाने भरलेला सिद्धू म्हणजेच सिद्धार्थ जाधव.

२७/११/२०१५ रोजी आमच्या शाळेतील रखवालदाराचे लग्न मुंबईत होते. बोलावले की जाणे या तत्वानुसार आम्ही काही मंडळी कारने जाण्यास निघालो. लग्न संध्याकाळी ७ वाजता होते. पण चाललोच आहोत तर थोडी मुंबई बघू या म्हणून लवकर निघालो. मुंबईतले मला तर काहीच समजत नाही. एका पुलावर गेल्या नंतर मैत्रिणीने एक फोन लावला. व आलोच असे सांगितले. एका पॉश इमारती जवळ थांबलो. गाडी पार्क करून वर गेलो तर स्वागताला साक्षात सिद्धार्थ जाधव! डोळ्यांवर विश्वासच बसेना. त्यांनीच आगत्याने घरात नेले. त्या धक्क्यातून बाहेर त्यांनीच काढले. आणि मग काय मन मिळणारा आनंद स्वीकारायला तयार झाले. माणसाने किती साधे, प्रेमळ व अगत्यशील असावे याचे प्रत्यंतर येत होते. आमच्या सोबत एकच टेबलवर आमच्या शेजारी बसून आम्ही बरोबर नेलेला खाऊ साधी शंकरपाळी त्यांनी आवडीने चहात बुडवून चमच्याने खाल्ली. आमच्या चकलीचा आस्वाद घेतला. तेही मुक्त कंठाने आमचे कौतुक करत. नंतर मैैत्रिणीने सांगितले ते तिचे भाचे जावई आहेत. तो पर्यंत किती वेळा त्यांचे आम्हाला आत्या म्हणून हाक मारणे झाले होते. नंतर लहान मुलाला लाजवेल अशा उत्साहात सगळे घर दाखवले. घराच्या आठवणी सांगितल्या. त्यातून एक जाणवले की त्यांच्या दृष्टीने घर, फॅमिली किती महत्वाची आहे. मुलीच्या अगदी छोट्या छोट्या बाललिला मोठ्या कौतुकाने व आत्ताच घडल्या प्रमाणे भरभरून सांगत होते. मधे मधे महत्वाचे फोन चालू होतेच. पण घरी गेस्ट आहेत, लांबून आले आहेत. आज सगळे कार्यक्रम रद्द आहेत असे सांगितले जात होते. आम्हाला उगीचच व्ही. आय. पी असल्या सारखे वाटत होते. दरम्यान त्यांच्या मिसेस ने जेवायला बोलावले. काय जेवलो आठवत नाही. कारण सगळे लक्ष त्यांच्याच बोलण्याकडे होते. मला फक्त एवढेच आठवते, ते मला म्हणाले होते आत्या तू नॉनव्हेज खात नाहीस ना म्हणून कोबीची भाजी खायची वेळ आली आहे. जेवणा नंतर परत गप्पा, घरातील वस्तू ( प्रात्यक्षिका सह ) दाखवणे चालूच होते. आम्हाला पण ट्रायल मिळत होती. त्या वेळी एखादे लहान मूल असल्या प्रमाणे ते भासत होते. आत्ता पर्यंत त्यांना फक्त छोट्या, मोठ्या पडद्यावर बघत होतो. तिच व्यक्ती साध्या रूपात अगदी घरगुती गप्पात रंगून गेली होती. त्यांनाही त्या वेळी कलाकार आहोत याचा विसर पडला असावा. एकच व्यक्ती किती वेगळी असू शकते याचे प्रत्यंतर घेत होतो. आमच्या प्रश्नांना खरी व मनमोकळी उत्तरे मिळत होती. मधेच लग्ना नंतर परत या. आज इथेच रहा असा आग्रह पण चालू होता. मधेच तुमच्या शाळेत ( म. न. पा. च्या शाळेत माझी नोकरी झाली आहे. ) बोलवा. असेही त्यांनी आग्रहाने सांगितले. त्यांचे शिक्षण महानगर पालिकेच्या शाळेत झाले आहे ही गोष्ट ते अभिमानाने सांगतात. व माझ्या येण्याने तुमच्या शाळेतून एक तरी सिद्धार्थ तयार होईल असे म्हणतात. संध्याकाळी ते जेव्हा जिम मध्ये जायला निघाले तेव्हा त्यांनीच आठवण करून दिली. माझ्या बरोबर सेल्फी घ्यायचा नाही का? असे त्यांनी गमतीने विचारल्यावर आम्ही फोटो काढले. त्या नंतर आम्हाला पण लग्नाच्या कार्यक्रमासाठी निघायचे होते. व परत कधी भेट होईल माहित नव्हते. निघताना आम्हाला वाकून नमस्कार ( पाया पडणे ) केला.

इतक्या प्रसिद्ध पण डोक्यात हवा न गेलेल्या एका सच्च्या कलाकाराने आमचा दिवस भारून टाकला होता.

एक कलाकार किती साधा, सच्चा असू शकतो. पण जीवनातील मोठी तत्वे अंगीकारतो याचा अनुभव खूप जवळून घेतला होता. विशेष म्हणजे त्यांच्या चित्रपटाच्या प्रीमिअर चे पास येतात त्या वेळी आवर्जून माझ्या नावाचा पास त्यात असतो. त्या नंतर आम्ही त्यांना आमच्या शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनास बोलावले होते. ते पण आवर्जून आले होते. मग काय शाळेत गर्दीच गर्दी पोलीस संरक्षण मागवावे लागले होते. एवढ्या गर्दीत पण त्यांनी माझ्या घरी आलेली आत्या कुठे आहे? म्हणून माझी विचारणा केली होती. माझ्या सारख्या व्यक्तीला लक्षात ठेवणे हे माझ्या साठी मोठे आश्चर्यच होते.

साधी रहाणी, खरेपणा, सर्वांना मदत करणे, उत्साह, बाल्य जपणे, माणसे धरून असणे असे अनेक पैलू समोर आले. आणि हा दिवस सिद्धार्थ दिवस ठरला तो कायम स्वरूपी आठवण ठेवून आहे.

© सुश्री विभावरी कुलकर्णी

सांगवी, पुणे

मोबाईल नंबर – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ विठ्ठल गोरा की सावळा? ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

??

☆ विठ्ठल गोरा की सावळा? ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

भारतीय सनातन परंपरेतील विविध देवतांची नावे ही गुणदर्शक आहेत. शं म्हणजे शुभ;  शुभ करणारा तो शंकर, तर वर्णाने काळा असणारा तो कृष्ण , सुंदर व मोहक गर्दन असणारा तो सुग्रीव आणि रमविणारा तो राम. अशी कितीतरी उदाहरणे देता येतील.   शंकरांचे वर्णन कर्पूरगौरा म्हणजे कापरासारखा गोरा असे असून देखील काही चित्रकारांनी महादेवाला काळे दाखवून त्याचा कृष्ण वर्ण प्रचलित केला आहे. 

तसेच पांडु म्हणजे पांढरा किंवा गोरा; पांडुरंग या संज्ञेचाच अर्थ जो रंगाने गोरा आहे असा होतो.  असे असतांना  आजकालच्या बहुतेक साहित्यिकांनी विट्ठलाचे सावळा किंवा काळा असे वर्णन  का केले आहे हेच समजत नाही ! पंढरपुरातील विठ्ठलाची मूर्ती काळ्या पाषाणातून बनविलेली असल्याने कदाचित हा अपप्रचार झाला असावा. तथापि तशा अनेक देवतांच्या मूर्ती काळ्या पाषाणाच्याच असतात की !

माझे स्पष्ट मत आहे की विट्ठल ऊर्फ पांडुरंग ही देवता गोऱ्या रंगाचीच आहे.  

© डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ भिक्षेकरी ते कष्टकरी ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ भिक्षेकरी ते कष्टकरी ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

जेवणात जर मीठ बरोबर असलं तर मिठाची आठवण कोणालाच येत नाही. परंतू हेच मीठ मात्र कमी पडलं की च्च…च्च…म्हणत सगळ्यांची मीठ शोधायची धांदल सुरू होते….! 

आपलं आयुष्यही या मिठासारखंच असावं…! 

…. आपल्या असण्याची जाणीव कोणाला असो किंवा नसो, परंतु आपल्या नसण्याची उणीव कोणाला तरी भासणे हे खरं सुख !…… मात्र, ज्यांच्या असण्या आणि नसण्याचं सोयर सुतक कोणालाच नाही….असे अनेक जण मला या महिन्यात भेटले…! 

त्यापैकीच या चौघी….

१. एक अंध ताई, डोळ्यातील ज्योत पूर्णपणे विझली आहे, परंतु मनातला अंगार मात्र विझलेला नाही…. 

—शिवाजीनगर परिसरात भीक मागायची. जिथे ती भीक मागायची, तिथेच तिला खाद्यपदार्थ विक्रीचा व्यवसाय सुरू करून दिला आहे.

२. दुसरी एक दिव्यांग ताई… तिचे पती सुद्धा दिव्यांग आहेत. एकमेकांच्या साथीने आयुष्याचं ओझं डोक्यावर पेलण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतू दरवेळी ते शक्य होत नाही, म्हणून ही ताई भीक मागायची…..

— हिला एक wheel chair दिली आहे. Artificial Jewellery त्याचप्रमाणे स्त्रियांची इतर प्रसाधन साधने तिला विक्रीसाठी घेऊन दिली आहेत. नानावाडा परिसर, तसेच शनिवार वाडा परिसर येथे ती आता हा व्यवसाय करू लागली आहे. 

३.  भवानी मातेसमोर जोगवा मागणारी ही तिसरी मावशी… कोणाच्याही आधाराशिवाय जगते आहे. तिला आपण भाजी, तसेच फळं विक्रीचा व्यवसाय सुरू करून दिला आहे–= त्यासाठी तराजू, वजन काटे, इत्यादी सर्व साहित्य घेवून दिले आहे. कॅम्प, भवानी पेठ, तसेच पुण्यातील राजेवाडी परिसर येथे तिने फिरून विक्री करण्यास सुरुवात केली आहे.

४. एक तरुण महिला शनिपार मंदिर, बाजीराव रस्ता येथे भीक मागत होती, त्याच परिसरात तिला खेळणी विक्रीचा व्यवसाय सुरू करून दिला आहे. 

…… या महिन्यात “महिला दिन” होता हा फक्त योगायोग ! 

“दीन” असणाऱ्या महिलांना, तुम्ही सुद्धा “माणसं” आहात याची जाणीव करून देत, आम्ही रोजच महिला दिन साजरा करत आहोत. 

कोणताही समारंभ नाही… “हार – तुरे” नाहीत…! 

…. आयुष्यात जगताना, कायम ज्यांची “हार” झाली, अशा दुर्दैवी आयुष्य जगणाऱ्यांना… पुन्हा गळ्यात “हार” घालण्याचं प्रयोजन काय…? 

…. खाली झुकलेली मान, जेव्हा सन्मानाने ताठ होते, त्यावेळी आमच्यासाठी तोच सण असतो… समारंभ असतो… महिला दिन तोच असतो….! आठ मार्चला आम्ही महिला दिन साजरा करत नाही…. तर तो रोज रोज जगतो…!!! 

५. याच महिन्यात रंगपंचमी येवून गेली…! आयुष्य रंगपंचमी सारखंच आहे…. कितीकदा चेहऱ्यावर रंग चढतो आणि कितिकदा परिस्थिती तो उतरवून टाकते…

…… असेच रंग उडालेले… पाय मोडून रस्त्यात खितपत पडलेले ते दोघे….! 

यांच्यावर आधी उपचार केले, दोघांनाही व्हीलचेअर दिल्या. त्यातील एकाच्या अंगी दाढी कटिंग करण्याचे कसब होते, त्याला लागणारे सर्व साहित्य घेऊन दिले. दुर्गंधीत असणाऱ्या आमच्या भिक्षेकर्‍यांचीही दाढी कटिंग करायला कोणी पुढे येत नाही…. मग यालाच आम्ही आमच्या भिक्षेकर्‍यांची दाढी कटिंग करायला लावून पगार द्यायला सुरुवात केली… ! 

…. इकडे “याला” रोजगार मिळाला तिकडे “ते” स्वच्छ झाले…

It’s our Win – Win situation….!!! 

६. दुसऱ्या एका व्यक्तीचा पूर्वी पायपुसणी विकायचा व्यवसाय होता… एक्सीडेंट होऊन, रस्त्यावर आल्यानंतर तो स्वतःच “पायपुसणं” होऊन बसला…

…. आता, पायपुसणी विकायचा व्यवसाय याला पूर्ववत टाकून दिला आहे…. ! पर्वती पायथा परिसरात तो फिरून हा व्यवसाय करत आहे…. 

…. या रंगपंचमीत आम्ही त्या अर्थाने जरी रंग खेळलो नाही… तरी, ज्यांच्या चेहऱ्यावरचे रंग उडालेले आहेत, अशांच्या चेहऱ्यावर स्वाभिमानाचा एक तेजस्वी रंग मात्र नक्की लावला आहे…. ! 

“भिकारी” या शब्दांची लक्तरं आम्ही होळीच्या आगीत अर्पण केली आहेत…. ! 

७. एक अपंग आजी... जंगली महाराज मंदिराच्या प्रवेशद्वारावरच भीक मागते…! 

….. या महिन्यात गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर… तिला एक व्हीलचेअर आणून दिली…. त्यावर तिला व्यवस्थित बसवलं, आणि तिच्या पायाशी वजन काटा ठेवला… तिला सांगितलं, ‘ लोक येतील, यावर आपलं वजन करतील आणि तुला पैसे देतील ‘…… अर्थातच बोहनी (भवानी) करण्याचा मान मला मिळाला…. ! 

८. पूर्वी पती असतांना सुस्थितीत असणारी एक मावशी…. पती अचानक गेल्यानंतर, सर्व काही बिघडले…. शनिपार येथे मग गळ्यात माळा घालून भीक मागायला सुरुवात केली… तिला स्वतःला भीक मागायची लाज वाटत असे… परंतु उपाशी पोटाला कुठं लाज असते ? अनेकांनी तिला अनेक सल्ले दिले…. परंतू भरल्या पोटानं दिलेला सल्ला, उपाशी पोटाला कधीही पचत नाही…! गुढीपाडवा हा सण साजरा करण्यासाठी, पूजा करण्यासाठी ज्या ज्या वस्तू लागतात या सर्व वस्तू, सणाअगोदरच या मावशीला घेऊन दिल्या आहेत… जेणेकरून ती या वस्तूंच्या विक्रीचा व्यवसाय करू शकेल…. ! 

या विक्रीतून जमा झालेल्या भांडवलातून आम्ही आता दुसरा कायमस्वरूपी व्यवसाय सुरू करणार आहोत. 

९. नवऱ्याने सोडून दिलेली बाळासह रस्त्यावर राहणारी एक ताई…. ! 

…. आमचा अन्नपूर्णा प्रकल्प चालवणारे, श्री अमोल शेरेकर यांचा मला एके दिवशी फोन आला, ‘ सर, या ताईचं काय करू ? ‘ 

.. मी विचार करून उत्तर देईपर्यंत ते म्हणाले, ‘ मी जिथे राहतो त्याशेजारी एक रूम खाली आहे. आपल्याला फक्त डिपॉझिट आणि या महिन्याचे भाडे आणि किराणा भरून द्यावे लागेल. माझ्या नजरेत एक काम आहे, मी या ताईला तिथे कामाला लावतो…. मार्च नंतर एकदा का हिला पगार मिळायला लागला, की मग आपल्यावर आर्थिक जबाबदारी राहणार नाही.’ 

…. मी काहीही बोलण्याअगोदर माझा होकार गृहीत धरून श्री अमोल शेरेकर कामाला लागले….

त्या रूमचे डिपॉझिट, मार्च महिन्याचे भाडे आणि किराणामाल भरून दिला आहे…. ! 

…. ही ताई स्वाभिमानाने एका कंपनीत आता छोटा जॉब करते, आज ३१ मार्चला तिचा पगार होईल…. ! 

कोणाच्याही आधाराशिवाय ती ताई तिच्या बाळासह स्वयंपूर्ण होईल….! 

.. या ताईला मी सांगून ठेवलं आहे, बाळ जेव्हा शाळेत जायच्या वयाचं होईल, तेव्हा मला सांग. संपूर्ण शाळेची जबाबदारी आमची…. ! 

… कृतज्ञतापूर्वक ती म्हणाली, ‘ उद्या एक तारीख आहे. आज माझा पगार होईल, आता माझा बोजा कोणावर पडणार नाही. मी खूप खूष आहे…’ असं म्हणून ती ओक्साबोक्षी रडायला लागली… ! 

…. आज प्रथमच कोणीतरी रडत होतं आणि तरी मी मनापासून हसत होतो…. ! अर्थात हे सर्व श्रेय श्री. अमोल शेरेकर यांचं, मी फक्त माध्यम होतो…. श्री अमोल शेरेकर यांचा मला अभिमान आणि कौतुक आहे ! 

…. या तिघींच्याही मनात “आत्मविश्वासाचा ध्वज” उभारून दिला आहे…. 

…. “प्रतिष्ठेच्या पताका” दारात नाही… पण मनात लावल्या आहेत…

…. नवीन जोमानं आयुष्य जगण्याची “गुढी” आम्ही उभारून दिली आहे…. 

…. नुसतं “नवीन वर्ष” नाही तर त्यांना “नवीन आयुष्य” सुरू करून दिलं आहे…

…. त्यांच्या आयुष्यातल्या “कडू आठवणी”…. कडुनिंबाचं पान चावता चावता, कधी गोड होऊन गेलं कळलंच नाही…. ! 

अशात भर दुपारी आईचा फोन आला, ‘अरे, येतो आहेस ना ? किती उशीर ? आज गुढीपाडवा आहे… घरची पूजा तुझ्या वाचून खोळंबली आहे…! ‘

…. पूजा माझ्या वाचून खोळंबली आहे…??? मला गंमत वाटली….

‘अजून कुठली पूजा राहिली आहे ?’ मी आईला हसत म्हणालो. 

‘ म्हणजे ?’ तिने भाबडेपणाने विचारले….

पूजा…पूजा…. म्हणजे काय असतं…. ? 

पूजा ज्यावेळी भुकेत शिरते त्यावेळी ती “उपवास” होते….

पूजा ज्यावेळी अन्नात शिरते, त्यावेळी ती “प्रसाद” होते…. 

पूजा ज्यावेळी पाण्यात शिरते, त्यावेळी ती “तीर्थ” होते…

पूजा प्रवास करते, तेव्हा ती “वारी” होते….

पूजा घरात येते, तेव्हा ते घर “मंदिर” होतं….

पूजा जेव्हा डोक्यात शिरते तेव्हा ती “नामस्मरण” होते…

पूजा जेव्हा हृदयात शिरते तेव्हा ती “अध्यात्म” होते…

आणि पूजा जेव्हा हातात शिरते, तेव्हा ती “सेवा” होते… !!! 

— आता अजून कुठली पूजा मांडू… ???

माझ्या या पुजेमध्ये आपण दिलेल्या समिधाच अर्पण केल्या आहेत…. आणि म्हणून भिकेच्या आणि लाचारीच्या दलदलीमधून बाहेर निघालेल्या, “त्या” जीवांनी दिलेल्या आशीर्वादाचा प्रसाद, लेखाजोखाच्या रुपाने आपल्या पायाशी अर्पण करतो…. गोड मानून घ्यावा ! 

प्रणाम 

 

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares