मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ बोलू कौतिके… अर्थात  Art of appreciation… ☆ सुश्री लीना सोहोनी ☆

??

☆ बोलू कौतिके… अर्थात  Art of appreciation… ☆ सुश्री लीना सोहोनी ☆

कौतुक, प्रशंसा, स्तुती हे एकाच वर्गातील पण जरा वेगवेगळ्या भावच्छटा असलेले शब्द आहेत. कौतुक हे मनापासून असतं, प्रशंसा लोकांसमोर, जरा वाजत गाजत करायची असते पण ती खरीच असते,  तर स्तुती ही केवळ समोरच्या व्यक्तीला प्रसन्न करण्यासाठी, त्या व्यक्तीच्या पुढे पुढे करण्यासाठी करण्यात येते व त्यामागे स्तुतिपाठकांचा बरेचदा सुप्त हेतू ( hidden agenda) असतो. पण आत्ता आपण केवळ कौतुकाविषयीच बोलणार आहोत. एखाद्याच्या achievement बद्दल मनापासून खरं खुरं कौतुक वाटणं आणि ते वाटत असल्याचं आपण शब्दातून किंवा कृतीतून त्या व्यक्तीपर्यंत पोचवणं. मग ते कौतुक शब्दात असेल, नजरेत असेल, कृतीत किंवा पाठीवर दिलेल्या शाबासकीत व्यक्त केलेलं असेल. पण ते व्यक्त होणं महत्वाचं! 

बरेच वेळा आपल्या परिचयातील एखाद्या व्यक्तीने काहीतरी वाखाणण्याजोगी कामगिरी करून दाखवलेली असते आणि ही गोष्ट इतकी सोपी नाही किंवा कदाचित ती आपल्यालासुद्धा जमणार नाही, ही गोष्ट आपल्याला मनातून खरंच पटलेली असते. पण तरीही आपण त्या व्यक्तीला मनापासून, भरभरून दाद देत नाही,  आपल्या तोंडून कौतुकाचे शब्द बाहेरच पडू शकत नाहीत.

असं का होत असावं? 

याचा जर नीट विचार केला, तर याचं उत्तर मनाच्या कोपऱ्यातच कुठेतरी दडून बसलेलं असतं. कदाचित आपण समवयस्क असू, नाहीतर मग समव्यावसायिक असू…कदाचित  ती व्यक्ती आपल्याहून वयाने, अनुभवाने लहान असेल आणि तिचं हे अनपेक्षित यश आपल्या अहंकाराला थोडासा धक्का देऊन गेलं असेल. पण मग आपण जर मनातून असं ठरवलं, की हा आपला अहंकार जरा वेळ बाजूलाच ठेवून द्यायचा आणि त्या व्यक्तीचं अगदी मनापासून, दिलखुलासपणे कौतुक करायचं..आणि आपण जर  खरोखर तसं केलं, तर त्याचा आपल्या आयुष्यावर फार मोठा, अगदी दूरगामी परिणाम दिसून येतो. 

पहिलं म्हणजे तुमच्याकडून अनपेक्षितपणे आलेल्या त्या  कौतुकाच्या शब्दांमुळे त्या व्यक्तीला अतिशय अप्रुप वाटतं, दोन मनं जवळ येतात आणि तुमच्यात व त्या व्यक्तीमध्ये एक अतूट नातं निर्माण होतं. दुसरं म्हणजे आपणच निर्मळ मनाने दुसऱ्या व्यक्तीचं जे appreciation केलेलं असतं त्यामुळे आपल्या मनाला आपलंच कौतुक वाटतं. आपण आपला अहंकार क्षणभर बाजूला ठेवू शकलो, दुसऱ्याच्या आनंदात निरामय वृत्तीने सामील होऊ शकलो, ह्याचा आनंद फार मोठा असतो. 

माझ्या मनोवृत्तीत बदल घडायला असाच एक प्रसंग घडला आणि मला त्यातून एक जिवाभावाची मैत्रीण मिळाली. खूप खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. माझ्या ओळखीची एक होती. वयाने माझ्यापेक्षा तरुण, हुशार, स्मार्ट, कॉन्फिडन्ट, लोकप्रिय.. तिच्या सहवासात येणाऱ्या इतर स्त्रियांना नक्कीच न्यूनगंड निर्माण होईल, असंच तिचं व्यक्तिमत्व होतं. मीही त्या गोष्टीला अपवाद नव्हते. आमची दोघींची मैत्री होणं शक्यच नव्हतं. 

पण एक दिवस एक वेगळीच गोष्ट घडली.

तिने एका स्पर्धेत स्पर्धक म्हणून भाग घेतला होता, त्या स्पर्धेची मी नेमकी एकमेव परीक्षक होते.  परीक्षण गुप्तपणे करायचं असल्यामुळे तिला या गोष्टीची काही कल्पना नव्हती. अपेक्षेप्रमाणेच ती या स्पर्धेत पूर्ण तयारीनिशी उतरली होती. इतर स्पर्धकही तसे तुल्यबलच होते. थोडक्यात सांगायचं, तर मी त्या स्पर्धेत तिला डावलून दुसऱ्याची निवड केली असती, तरी या कानाचं त्या कानाला कळलं नसतं. स्पर्धेचा निकाल ऐकल्यावर तिचा तो कॉन्फिडन्स, तो नखरा किंचित उतरला असता, ते सुंदर धारदार नाक जरातरी खाली झालंच असतं. केवढी संधी माझ्याकडे आयती चालून आली होती.

काय करू? मीच परीक्षक असून तो मला माझ्या परीक्षेचा क्षण वाटला. मी स्वत:शी भांडले आणि अखेर माझ्या विवेकाने मला हरवलं. मी माझ्या सारासार विवेकाला म्हणाले, “ तुझं खरंय. आज मी जर नि:पक्षपातीपणाने निर्णय दिला नाही, तर मीच माझ्या मनातून उतरेन. मला माझ्या वागण्याची लाज वाटेल आणि मी स्वत:ला कधी माफ करू शकणार नाही. त्यामुळे आज मी तिचा जाहीर हिरमोड करण्याची ही संधी सोडून देते आणि तिला तिच्या पात्रतेनुसार या स्पर्धेत प्रथम क्रमांक देऊन टाकते. 

यथावकाश स्पर्धेचा निर्णय जाहीर झाला. तिने मोठ्या दिमाखात मला फोनवर ती बातमी कळवली. मी तिचं मोजक्या शब्दात अभिनंदन केलं. बक्षीस समारंभाला मी हजर राहू शकले नाही, म्हणून माझं मनोगत लिहून संयोजकांकडे पाठवून दिलं. अखेर त्या समारंभात तिला त्या स्पर्धेचं  परीक्षक कोण होतं ते समजलं. दुसऱ्या दिवशी तिचा परत माझे आभार मानायला फोन आला. मी म्हटलं, “माझे कशासाठी आभार? You deserved it, so you got it.” 

नंतर ती मला तिच्या बक्षिसाची पार्टी द्यायला रेस्टॉरंटमध्ये घेऊन गेली. मीही तिला एक छानशी गिफ्ट घेऊन गेले. त्या स्पर्धेचा आणि परीक्षणाचा विषय निघालाच नाही, पण आमच्या चांगल्या ३-४ तास गप्पा रंगल्या. त्या दिवशी मला एक जिवाभावाची मैत्रीण मिळाली. आमची सुमारे वीस वर्षापूर्वी झालेली मैत्री अजूनही तेवढीच घट्ट आहे. तिची मुलगी माझी लाडकी भाची आहे आणि मी तिची  फेव्हरिट मावशी. एकमेकींच्या आयुष्यातील सुखदु:खांच्या क्षणाच्या आम्ही साक्षीदार झालो आहेत. 

आपल्या मनातल्या सतत वर डोकं काढू पाहाणाऱ्या  अहंकाराला जर आपण दडपून गप्प बसवू शकलो, तर आपल्याला जन्मभर पुरेल एवढी प्रेमाची, मैत्रीची शिदोरी प्राप्त होते, हा माझा अनुभव आहे. पुढील आयुष्यात असे अनेक प्रसंग आले, पण प्रत्येकवेळी मी मनातल्या अहंकाराला बाजूला ठेवून मनात उमटलेले  योग्य ते कौतुकाचे शब्द त्या त्या व्यक्तींपर्यंत पोचवू शकले.

गेल्या आठवड्यात एका कार्यक्रमासाठी परगावी गेले असताना मला तिथे एक मैत्रीण म्हणाली, “ आमच्या इथल्या वर्तुळात खूप हेवेदावे, गटबाजी चालते. तुमच्या पुण्यात तसं काही आहे की नाही?”

त्यावर मी म्हटलं, “तसं पुण्यात आहे की नाही, याची मला खरं तर कल्पनाच नाही, कारण ना मला कुणाचा हेवा वाटतो, ना माझा कुणी हेवा करतं. आपला कुणी हेवा करावा असं  माझ्याकडे काहीच नाही आणि मला कुणाचा हेवा वाटावा, असं दुसऱ्या कुणाकडे नाही. ‘सर्वेपि सुखिन: सन्तु’, हा सुखी जीवनाचा मंत्र मी अंगिकारलेला आहे.

जर एखाद्या व्यक्तीने खरंच स्पृहणीय कामगिरी केली असेल, तर आपण कौतुक करण्यात आखडता हात कशासाठी घ्यायचा? तुम्हाला काय वाटतं… ?

लेखिका : ## लीना सोहोनी

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मी व्हायोला हाउसिंग सोसायटी बोलतेय… ☆ सौ. विद्या पराडकर ☆

सौ. विद्या पराडकर

??

☆ मी व्हायोला हाउसिंग सोसायटी बोलतेय… ☆ सौ. विद्या पराडकर ☆

माननीय महापौर,

महानगरपालिका… 

स.न.वि.वि.

को.हा.सोसायटीच्या प्रगतीकरता व विकासासाठी आपण जे निरनिराळे उपक्रम राबवता, मार्गदर्शन करता, प्रोत्साहन देता त्याकरता प्रथम मी आमच्या सोसायटी तर्फे आभार मानते.

प्रस्तुतच्या उपक्रमात आपण निरनिराळ्या सोसायट्यांची  स्पर्धा आयोजित केली त्यानिमित्त, मी व्हायोला सोसायटी, माझी ओळख व वैशिष्ट्ये, या परिसरातील माझे स्थान याविषयी माहिती सांगणार आहे.

मुंबई पुणे महामार्गाला लागून जो सर्व्हिस रोड आहे त्याला लागुनच माई मंगेशकर हॉस्पिटल पासूनची चौथी जी टोलेजंग इमारत आहे, ती माझीच बरे. माझ्या कपाळावर ठसठशीत कुंकू वापरल्याचे असणारे माझे नाव झळकते आहे. त्यामुळे माझे कपाळ उठून दिसत आहे. मी उंच असल्यामुळे खूप दूरपर्यंत दिसू शकते. मुख्य प्रवेश दारापाशी मी सर्व लोकांचे स्वागत करण्याकरता मोठ्या आनंदाने हात जोडून उभी असते.

… ‌माझा जन्म १९९८साली झाला. पण माझे नामकरण २०००साली झाले. तेव्हापासून या भागाचे प्रमुख आकर्षण व भूषण म्हणून माझी ओळख आहे

प्रवेश दारातून आत आल्यावर उजवीकडे छोटे लॉन आपले स्वागत करते. विविध वृक्षांनी हे लॉन वेढलेले आहे. निरनिराळे विविध रंगी पक्षी येथे मंजूळ गाणी गात असतात. रात्रीच्या वेळी रंगीबेरंगी दिव्यांची आरास खूप छान दिसते. झाडांना विविध आकारांनी सजविले आहे. सकाळी लोक हिंडायला येतात. संध्याकाळी बच्चे कंपनी हुंदडत असते. जाणाऱ्या येणाऱ्याची चहल पहल असते. मी हर्षाने न्हात असते.

मी माझ्या आठ विंग मध्ये विभागली आहे. एकूण १७० सदनिका आहेत. प्रथम दर्शनी एच विंग ३बी.एच.के दिमाखात उभे आहे. त्याच्या बाजूला २बी एच.के विराजमान आहे. व त्यानंतर १बी.एच.के.आहे. या सर्व सदनिका अत्याधुनिक सुखसोयींनी युक्त आहेत .प्रत्येक इमारतीच्यामध्ये एक छोटासा साजिरा,गोजिरा बगिचा आहे. दोन्ही इमारतींची शान वाढविण्याचे काम हा बगिचा करतो. येथेच झेंडा वंदन व इतर राष्ट्रीय कार्यक्रम होत असतात.

ई. इमारतीजवळ वनश्रीने नटलेला एक सुरेख व सुबक स्विमिंग पूल आहे. निळेशार पाणी त्यात खुलुन दिसते. विशेषतः उन्हाळ्यात रसिकांची गर्दी उसळते. लहानापासून तो मोठ्यापर्यंत जलतरण करण्याकरता उत्सुक असतात.

माझ्या लोकांसाठी, त्यांच्या आरोग्यासाठी जीमची व्यवस्था केली गेली आहे. लहान मुलांसाठी स्वतंत्र playground ची व्यवस्था केली आहे. लहान मुले नाचत बागडताना पाहिले की मी आनंदाने बेभान ‌होते.

निरनिराळे उपक्रम येथे राबविले जातात. जसे वृक्षारोपण, सांस्कृतिक कार्यक्रम, विविध स्पर्धा, स्वच्छता मोहीम ‌इत्यादि.माझे सर्व रहिवासी गुण्यागोविंदाने राहतात. ‘United we all, divided we fall ‘ हे तत्व त्यांना माहित आहे. माझा कारभार सुव्यवस्थित होण्यासाठी सक्षम कार्यकारी मंडळ योजले आहे. मी विविधतेने नटलेली असले तरी एकतेच्या धाग्यात गुंफलेली आहे.

साहेब, मी आतापर्यंत खूप बोलले. मला वाटतं की स्पधेर्च्या दृष्टीने ही माहिती पुरेशी आहे. असेच नवनवीन स्पर्धा वे उपक्रम घेत जावे, व आम्हाला  संधी देत जावे  ही विनंती.

– एक स्पर्धक

व्हायोला को.हा.सो.

©  सौ. विद्या पराडकर

वारजे  पुणे.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ पर्यटनाच्या निमित्ताने… ☆ प्रा.डॉ.सतीश शिरसाठ ☆

प्रा.डॉ.सतीश शिरसाठ

??

☆ पर्यटनाच्या निमित्ताने… ☆ प्रा.डॉ.सतीश शिरसाठ ☆

२०१८च्या जून महिन्यात मी बाली इथं एका परिषदेत भाग घेण्यासाठी, तर त्याच वर्षी नोव्हेंबर महिन्यात दुसऱ्या एका परिषदेत सहभागी होण्यासाठी माॅरिशसला गेलो होतो. परिषदांमध्ये सहभागी होऊन मी माझे रिसर्च पेपर सादर केले. परिषदांच्या कामकाजानंतर दोन्ही देशांत साधारणत: एक एक आठवडा मुक्काम झाला. आयोजकांनी तिथल्या विविध सामाजिक,शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील  अनेक संस्थांना आमच्या भेटी घडवून आणल्या. भरपूर साईट सिईंगही केले.निसर्गरम्य समुद्रकिनारे, रंगीबेरंगी मनमोहक फुलांच्या बागा,श्रममहात्म्याने विकास पावलेले समाज,सामाजिक सौदार्ह आणि शांतता असं  बरंच काही चांगलं पाहिलं..आपल्याकडं ज्या नाहीत, त्या अनेक वैशिष्ट्यपूर्ण बाबी पाहून भारावून जायला नक्कीच झालं. रहाण्याची व्यवस्था, खाणंपिणं, प्रवास हेही नियोजनबद्ध आणि सुरेख होतं.

माझी मुलगी  इंग्लंडला एका नावाजलेल्या हाॅस्पीटलमध्ये डाॅक्टर आहे. तिच्याकडं जायचं खूप दिवस चाललं होतं. पण माझ्या नोकरीच्या  काळात ते शक्यच झालं नाही. त्यात मधले काही दिवस कोरोनामुळे जमलंच नाही. जगभर सगळीकडंच सारं ठप्प झालं होतं. सप्टेंबर २०२१ ला मी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून प्राध्यापक पदावरून सेवानिवृत्त झालो.आणि  पत्नीबरोबर  इंग्लंडला जायचं आम्ही ठरवलं. त्यात अनेक अडचणीही आल्या. सेवानिवृत्त होऊनदेखील बरेच दिवस पेन्शन आणि इतर आर्थिक बाबी मिळण्यास खूपच उशीर झाला. अनेक शारीरिक व्याधींनी मी त्रासून गेलो. तशाही अवस्थेत अनेक संबंधित ऑफिसांत जाऊन मी पायपीट करत होतो. “तुम्ही लवकर या” असा मुलीचा  लकडा चालूच होता.आम्हा दोघांचे पासपोर्ट हातात आले. इंग्लंडचा व्हिसा कित्येक दिवस झाले तरी मिळाला नाही. दिवसांमागून दिवस जात होते. इंग्लंडला जायचं नियोजन धूसर दिसत चाललं. रशिया- युक्रेन युद्धामुळं हा वेळ लागतो,असं सांगितलं गेलं. जाण्याची जय्यत तयारी करून आम्ही व्हिसाची वाट पहात बसलो.

असाच एक दिवस सायंकाळी मोबाईलवर मेसेज आला की,आम्हा दोघांचे पासपोर्ट तयार असून ते घेऊन जावेत. इंग्लंडला जायचा मुहूर्त एकदाचा मिळाला.

मुलीशी  फोनवरून बोलून जाण्याची आणि परत भारतात येण्याचीही तारीख ठरवली. व्हिसा मिळायला उशीर झाल्यामुळे फक्त दोन महिने तिच्याकडं रहाता येणं शक्य होतं. विमानाची तिकिटं तिनंच काढली.  १९ जूनला आम्ही मुंबईहून डायरेक्ट विमानाने इंग्लंडच्या हिथ्रो विमानतळावर पोहचलो. तेव्हा तिथं सायंकाळ झाली होती.

विमानतळावरून बॅगा घेऊन बाहेर आलो. हा सिझन तिथं तर उन्हाळ्याचा होता. पण तिथली थंडी सहन होत नव्हती. बाहेर रिमझिम पाऊसही पडत होता. जर्किन आणि कानटोपी चढवून छत्रीही उघडली. एका टॅक्सीनं आम्ही  लंडनच्या जवळ असलेल्या मुलीच्या फ्लॅटवर पोहोचलो.  पुस्तकांतून,  चित्रपटांतून दाखवलं जातं तसं जाताना अनुभवलं. खड्डे नसलेले सुबक रस्त्यावरून जाताना इतस्तत: सगळीकडं जाणवेल इतकी स्वच्छता होती. सगळं काही आखीव रेखीव होतं. रस्त्यावरून अनेक वाहने भरधाव वेगाने जात होती. पण तीही ट्रॅफिकचे नियम पाळून. आमच्या वास्तव्यात इंग्लंडमधील लंडन, केंब्रिज अशा अनेक शहरांत आम्ही जाऊन बरंच पाहिलं. लहानपणापासून मला  क्रिकेटची खूप आवड. गावी  मी खूप क्रिकेट खेळलो होतो. मला आठवतं एकदा तीन गावांची क्रिकेटची टुरनामेन्ट होती. त्यात मी सलग तीन विकेट घेऊन हॅटट्रिक केली होती.

लंडनमधील लाॅर्डसच्या ग्राऊंडला ‘क्रिकेटची पंढरी ‘म्हणतात. ते पहाण्याची संधी मला मिळाली. ते मला सोनेरी स्वप्नच वाटलं .या क्षणांना मी कवितेत गुंफले — 

पाहिलं मी लाॅर्डसचं  मैदान…

विस्तीर्ण रस्त्यांच्या महिरपींनी नटलेलं,

इंद्रधनु स्वप्नांसारखं, परिकथेतील सुंदर,

पाहिलं मी लाॅर्डसचं मैदान—

कपिलदेवसोबतच अनेक भारतीयांच्या तसबीरींनी आणि

विक्रमगाथांनी इथल्या ड्रेसिंगरूम सजल्या होत्या, 

सचिनचे प्रेरक शब्द तिथली एक भिंत अभिमानाने मिरवत होती,

१९८३ मधल्या भारताच्या विश्वविजयाचा प्रुडेनशीयल चषक 

तिथल्या म्युझियममध्ये पाहिला, आणि … 

बघता बघता लाॅर्डसचं मैदान शतपटींनी उजळून निघालं…

आपल्याकडं जत्रेत जसे पाळणे असतात तसाच एक अतिविशाल पाळणा थेम्स नदीकाठावर आहे.त्यातून लंडनमधील अनेक गोष्टी दाखवल्या जातात. त्याला ‘लंडन आय ‘म्हणतात. या लंडन आयमधून अनेक   सुंदर सुंदर बाबी आम्हाला दाखवल्या. नंतर पायी चालत लंडनमधून जाताना, लंडन आयमधून  जे दिसलं नव्हतं, त्या ब-याच बाबी पहायला मिळाल्या. हेही मी शब्दात मांडलय — 

दर्शन…

अतिभव्य पाळण्यावरच्या लंडन आयनं,

लंडनचं मनोहारी दर्शन मला दिलं ,

आकाशातल्या सूर्यकिरणांनी

चमचमणारे पाणी मला दाखवलं,

भव्य ब्रिटिश संसदेचे आणि युरोपातल्या अतिऊंच इमारतीचे 

दर्शन मला घडवलं,

जगाला भूषणावह अनेक विक्रमांच्या साक्ष असलेल्या टोलेजंग  इमारती दाखवल्या ,

त्या इमारतींच्या भवतालच्या पाचूंच्या बागांतून उमललेली रंगीबेरंगी फुलं दाखवली,

टाॅवर ब्रिजसकट अनेक सुंदर पूल दाखवले,

निखळ आनंदाने हसणारी, खिदळणारी माणसं दाखवली;

लंडनच्या रस्त्यावरून जाताना पाहिलं,

ठिकठिकाणी बोकाळलेले जुगारांचे बाजार,

खाऊन पिऊन झाल्यावर त्याचे रिकामे कागद रस्त्याच्या कडेला फेकून देणारी माणसं,

येणा-या जाणा-यांना गुलाबाची फुलं देऊन पैसे उकळणाऱ्या बायका

आणि– 

“हेल्प मी,गाॅड मे ब्लेस यू ” या पाटीआड डोकं खुपसून बसलेला मळलेल्या  कपड्यातला एक याचक— 

जगावर राज्य केलेल्या इंग्लंडमधील स्वच्छता, टापटीप, निटनेटकेपणा हे जितके भावले, त्याचबरोबर तिथल्या  समाजातील औपचारिकता मला मानवी जीवनातील कोरडेपणा जाणवून गेली. आपल्या समाजात अनेक उणिवा आहेत. त्या स्वीकारूनही इंग्लंडमधील  कुटुंबसंस्था ही मला चिंतेची बाब वाटली.आपल्या आणि इंग्लंडमधल्या समाजरचनेची तुलना करता आपल्याकडं सगळं आबादीआबाद आहे असं मला म्हणायचं नाही. तरीपण एक सांगावसं वाटतं….. आपल्याकडं प्रबोधन आणि परिवर्तनाच्या अनेक चळवळी   झाल्यात. अनेक कारणावरून त्या अनेकदा खंडितही झाल्या. या अधिक गतिमान केल्या तर — आपल्याकडील न्यूनता नक्कीच कमी होईल.

© प्रा.डाॅ.सतीश शिरसाठ

सेवानिवृत्त प्राध्यापक, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे

मो व वाटसॅप नं. – ९९७५४३५१५२, ईमेल- [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माती भिडली आभाळा… भाग-2 ☆ श्री विश्वास विष्णु देशपांडे ☆

श्री विश्वास विष्णु देशपांडे

?मनमंजुषेतून ?

☆ माती भिडली आभाळा… भाग-2 ☆ श्री विश्वास विष्णु देशपांडे

(म्हणून मला शांताबाईंच्या ‘ अजब सोहळा, माती भिडली आभाळा ‘ या गाण्याच्या ओळी आठवल्या. इथून पुढे…)  

तो खांब तरी किती भाग्यवान म्हणायचा ! अखिल विश्वाला वंदनीय असलेल्या ज्ञानेश्वर माऊलींनी त्याचा आधार घेतला. तो त्यांच्या स्पर्शानं पावन झाला. आपली कठोरता त्यानं त्यागली आणि माऊलींच्या व्यक्तिमत्वातली शीतलता, पावित्र्य धारण केलं. महाराष्ट्र ही संतांची भूमी. इथल्या मातीचा कण न कण त्यांच्या पदस्पर्शाने पावन झाला आहे. इथल्या शिळा सुद्धा पवित्र आहेत. उगीच नाही गोविंदाग्रजांनी …. 

मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा 

प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा 

राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा 

नाजूक देशा, कोमल देशा, फुलांच्याही देशा 

…असे सुंदर महाराष्ट्राचे वर्णन केले ! इथले दगडही पावन आहेत. हा खांब तर एवढा पवित्र की पुढे त्याच्याभोवती मंदिर उभारले गेले. एरव्ही मंदिरात खांब असतात, पण खांबासाठी मंदिर उभारले जावे हा ही एक ‘ अजब सोहळा ‘. त्याचं कारणच तसं आहे. ज्या ज्ञानेश्वरांची पाठ समाधीस्थानीही जमिनीला टेकली नाही, त्याची पाठ या खांबाला टेकली. प्रख्यात लेखिका दुर्गा भागवत आपल्या ‘ पैस ‘ या पुस्तकात त्याबद्दल बोलताना म्हणतात, ‘ ख्रिस्ती धर्म जसा जगभर पसरला, तसा वारकरी पंथ पसरला असता,तर ख्रिस्ताच्या क्रुसाप्रमाणे हा स्तंभही जगभर गेला असता. पण बरे झाले तसे नाही झाले ते. तो इथेच राहिला. वारकऱ्यांना त्याचे दर्शन घ्यायला इथेच यावे लागते. ‘ ज्ञानेश्वरी इथे सांगितली गेली म्हणून वारकरी संप्रदायाचे हे आद्य पीठ आहे. 

पण माऊलींनी ज्ञानेश्वरी सांगितल्यानंतर साधारणपणे तेरा ते एकोणिसाव्या शतकापर्यंत हे अत्यंत पवित्र असे स्थान विपन्नावस्थेत होते. संत ज्ञानेश्वरांची कर्मभूमी असलेले हे स्थान ! या स्थानाची लोकांना विस्मृती झाली होती. या स्थानाला उर्जितावस्थेत आणण्यासाठी एखाद्या समर्पित त्यागी साधकाची आवश्यकता होती. आज हे स्थान आपल्याला आपल्याला ऐश्वर्यसंपन्न भासते त्यामागे वारकरी संप्रदायाचे महान उपासक वै. सोनोपंत दांडेकर मामांचे शिष्य ह.भ.प. बन्सी महाराज तांबे यांचे मोठे योगदान आहे. 

पैठणहून आळंदीला जाताना ज्ञानेश्वर, निवृत्तीनाथ, सोपान आणि मुक्ताबाईंनी या ठिकाणी काही दिवस मुक्काम केला. असे म्हणतात की पैठणला ज्या रेड्याकडून ज्ञानेश्वर माऊलींनी वेद वदवून घेतले, तो रेडा देखील या ठिकाणी त्यांच्या सोबत होता. इथेच निवृत्तीनाथांनी ज्ञानोबा माऊलींना ज्ञानेश्वरी लिहिण्याची आज्ञा दिली. इथेच त्यांना तसे का वाटावं ? तर या स्थानाचा महिमाच तसा होता. या ठिकाणी साक्षात श्री विष्णूंनी मोहिनीरूपात दहा दिवस निवास केला होता. त्यांनी निवास केला म्हणून हे ‘ नेवासे ‘ असे म्हटले जाते. त्या मोहिनीराजांचं सुंदर हेमाडपंती मंदिर इथे आहे. 

समुद्रमंथनातून जेव्हा चौदा रत्ने बाहेर पडली, तेव्हा त्यात अमृताचा कलश हाती घेऊन धन्वंतरी प्रकट झाले. अमृत हे अमरत्व प्रदान करणारे होते. म्हणून देव आणि दानव यांच्यात अमृत वाटपावरून भांडणे सुरु झाली. त्यात भगवान विष्णूंनी मोहिनीरूप धारण करून देवांना अमृत आणि दानवांना सुरा म्हणजे मदिरा वाटप केली. हे राहू आणि केतूच्या लक्षात आले. राहू अमृत प्राशन करण्यासाठी आपले रूप बदलून देवांमध्ये जाऊन बसला. श्री विष्णूंच्या हे लक्षात आल्यानंतर त्यांनी आपल्या सुदर्शन चक्राच्या साहाय्याने राहूचा शिरच्छेद केला. त्याचे शीर उडून ज्या ठिकाणी पडले त्या गावाला राहुरी असे नाव प्राप्त झाले. तर त्याचा देह म्हणजे काया ज्या ठिकाणी पडली, ते कायगाव म्हणून प्रसिद्ध झाले अशी दंतकथा आहे. 

तात्पर्य हे इतके पवित्र ठिकाण आहे. इथे एकदा श्री विष्णूंनी अमृत वाटप केले. दुसऱ्यांदा ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीच्या रूपात साऱ्या जगाला अमृत प्रदान केले. ज्ञानेश्वरी म्हणजे मराठी सारस्वताचे सौभाग्यलेणे. काव्य आणि तत्वज्ञान यांचा सुरेख संगम. यानंतर त्याठिकाणी अमृतासमान अनुभव देणारा अमृतानुभव हा ग्रंथ ज्ञानेश्वर माऊलींनी लिहिला. ज्या प्रवरा नदीच्या काठावर हे तीर्थक्षेत्र वसले आहे, त्या प्रवरेला ‘ अमृतवाहिनी ‘ असे संबोधले जाते. येथून जवळच गोदावरी आणि प्रवरेचा संगम आहे. या संगमावर देवगड हे पवित्र स्थान आहे. जवळच शनी शिंगणापूर आहे. असा हा रम्य आणि पवित्र परिसर. या पवित्र, शांत आणि रम्य स्थळी खरोखरच वेळ काढून जायलाच हवं. 

– समाप्त –

(कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा.)

 ©️ श्री विश्वास विष्णु देशपांडे

चाळीसगाव.

 प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माती भिडली आभाळा… भाग-1 ☆ श्री विश्वास विष्णु देशपांडे ☆

श्री विश्वास विष्णु देशपांडे

परिचय

श्री विश्वास विष्णू देशपांडे, चाळीसगाव

  • सेवानिवृत्त मुख्याध्यापक .
  • सोशल मीडियावर गेली सहा वर्षे सातत्याने विविध विषयांवर लेखन.
  • वर्तमानपत्र, दैनिके इ तून विविध लेख प्रसिद्ध
  • औरंगाबाद येथून प्रकाशित होणाऱ्या दैनिक आधुनिक केसरी या ई वृत्तपत्रातून अनेक लेख ‘ उगवतीचे रंग ‘ या सदराखाली प्रकाशित
  • तरुण भारतच्या ‘ आसमंत ‘ पुरवणीत ‘ थोडं मनातलं ‘ हे साप्ताहिक सदर सुरू.
  • आदर्श शिक्षक पुरस्कार, बाळशास्त्री जांभेकर आदर्श राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार इ पुरस्कार…
  • सहसचिव, म सा परिषद, पुणे शाखा चाळीसगाव

प्रकाशित पुस्तके :

  1. कवडसे सोनेरी… अंतरीचे
  2. आकाशझुला
  3. अष्टदीप (आठ भारतरत्नांची प्रेरणादायी चरित्रे)
  4. आनंदाच्या गावा जावे. (आनंद, ज्ञान देत सकारात्मक दृष्टिकोन देणारे लेख)
  5. रंगसोहळा (ललित लेख)
  6. रामायण : महत्त्व व व्यक्तिविशेष (रामायणातील पात्रे आणि त्यांचा आजच्या संदर्भातील संदेश, रामायणकालीन शिक्षण, समाजरचना इ रसाळ भाषेत सांगणारे पुस्तक)
  7. महर्षी वाल्मिकी चरित्र (या पुस्तकावर आधारित महर्षी वाल्मिकीच्या जीवनावर एक लघु चित्रपट देखील येणार आहे.)

विशेष :

  • नाशिक येथील एफ एम रेडिओ विश्वासावर गेल्या दोन वर्षांहून अधिक काळ दर मंगळवारी व शुक्रवारी सकाळी आठ वाजता ‘या सुखांनो या’ हा कार्यक्रम प्रसारित होतोय.
  • याच रेडिओवर आनंदघन लता हा कार्यक्रम अकरा महिन्यांपासून सुरू आहे. या कार्यक्रमाचे आतापर्यंत 46 भाग सादर झाले आहेत.

?मनमंजुषेतून ?

☆ माती भिडली आभाळा… भाग-1 ☆ श्री विश्वास विष्णु देशपांडे ☆

गारंबीचा बापू ‘  या चित्रपटात शांता शेळके यांचं एक सुरेख आणि अर्थपूर्ण गाणं आहे. ‘ अजब सोहळा, माती भिडली आभाळा…’ रवींद्र साठे यांनी  असं काही भावपूर्ण आवाजात गायिलं आहे की  मला हे गीत नेहमी गूढ, गंभीर आणि रहस्यमय वाटत आलं आहे.  पण त्यातील अर्थ जाणवावा, त्याचा प्रत्यय यावा असाच काहीसा अनुभव परवाच्या दिवशी आला. मी पुण्याहून गावाकडे परत येत असताना नगर-औरंगाबाद रस्त्यावर नेवासे फाटा लागतो. अनेकदा येताना जाताना या गावावरून गेलो आहे. पण परवा सहज मनात आलं की हेच ते नेवासा ना जिथे ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली ? आपण कधी गेलो का तिथे ? मग ठरवलंच की परत जायला कितीही वेळ होवो, आज आपण तिथे जायचंच आणि त्या पवित्र ठिकाणाचं दर्शन घ्यायचं. 

मुख्य रस्त्यापासून आणि नेवासे फाट्यापासून नेवासे गाव साधारणपणे पाच किमी आत आहे. जाताना मध्ये थोडाफार कच्चा रस्ता लागतो. पण माऊलींचं दर्शन घ्यायचं एकदा मनानं घेतलं की रस्ता कच्चा असो की चांगला, सहज पार होतो. गावात शिरता शिरता एकाला विचारलं, ‘ माऊली ? ‘ एवढा एकच शब्द पुरेसा होता. त्याने लगेच मंदिराच्या दिशेकडे बोट दाखवलं. माऊली म्हटलं की झालं. कोण माऊली असा प्रश्न पडत नाही एवढी थोरवी त्या एकाच माऊलीची. मंदिराकडे जाताना सुंदर हिरवीगार शेतं मन आकर्षून घेत होती. माऊलींच्या मंदिरासमोरचा परिसर निसर्गरम्य, शांत आणि प्रसन्न भासत होता. मंदिरासमोर चिंचा लगडलेली छान चिंचेची झाडं. झाडाखालीच एक माऊली हार आणि प्रसाद विक्रीसाठी घेऊन बसलेली. तिच्याकडून दोन हार आणि प्रसाद घेतला. कमानीतून मंदिराच्या आवारात प्रवेश केला. मंदिराचे आवार प्रशस्त, शांत, स्वच्छ अन प्रसन्न. 

थोड्याशा पायऱ्या चढून मंदिरात पोहोचलो तो भव्य सभामंडप दिसला. पाहतो तो त्यात पंचवीस तीस स्त्री पुरुष ज्ञानेश्वरीचं पारायण करतानाचे सूर कानी आले. त्यामुळे मंदिराचं वातावरण आणखीनच प्रसन्न वाटत होतं . ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायातील ओव्या कानावर पडत होत्या. 

उपजे तें नाशे । नाशलें पुनरपि दिसे ।

हें घटिकायंत्र तैसें । परिभ्रमे गा ॥ 

ना तरी उदो अस्तु आपैसे । अखंडित होत जात जैसें ।

हें जन्ममरण तैसें । अनिवार जगीं ॥ 

‘जे जे उपजते किंवा जन्म घेते ते ते नाश पावते. नाश पावलेले पुन्हा दुसऱ्या रूपाने प्रत्ययास येते. सूर्य आणि चंद्राचा उदय अस्त हे अखंडित सुरूच असतात. त्याचप्रमाणे जन्ममरणाचे हे चक्र अविरत सुरू राहते. तेव्हा एखाद्या व्यक्ती किंवा वस्तूबद्दल आसक्ती मनात धरणे आणि तिच्या नष्ट होण्याने शोक करणे व्यर्थ आहे. ‘ या अर्थाच्या या सुंदर ओव्या कानी पडल्या. ज्या ठिकाणी साक्षात माऊलींनी ज्ञानेश्वरी सांगितली, त्याच ठिकाणी तिचे मनन, पठण किंवा पारायण करणारी ही मंडळी किती भाग्यवान आहेत असा विचार मनात आला. 

मंदिरात प्रवेश केला की उजव्या बाजूला प्रथम दर्शन घडते ते शिवलिंगाचे. नंतर ज्ञानेश्वरांनी ज्या खांबाला ( पैस ) टेकून ज्ञानेश्वरी सांगितली तो पैसाचा पवित्र खांब. आणि त्याच्या शेजारी असलेल्या भागात संत ज्ञानेश्वर, जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि ज्यांनी ज्ञानेश्वरी उतरवून घेतली ते सच्चिदानंदबाबा यांच्या सुंदर मूर्ती आहेत. 

पूर्वी ज्ञानेश्वरांनी जेव्हा ज्ञानेश्वरी लिहिली, तेव्हा या ठिकाणी करवीरेश्वराचे मंदिर होते. तेथील खांबाला टेकून ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सांगितली. 

शके बाराशे बारोत्तरे । तैं टीका केली ज्ञानेश्वरे । 

सच्चिदानंदबाबा आदरें । लेखकु जाहला ॥

— अशी ही तेराव्या शतकात लिहिलेली ज्ञानेश्वरी. 

काळाच्या ओघात ते करवीरेश्वराचे मंदिर नष्ट झाले.  पण माऊलींनी ज्या खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली, तो खांब मात्र तसाच राहिला. त्या खांबानं जणू आभाळ पेललं. आभाळ पेलण्याइतका तो उंच झाला. माऊलींनी त्याला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. ज्ञानेश्वर म्हणजे आभाळच. ज्ञानेश्वरी म्हणजे सुद्धा आभाळ. इथला खांब हा पृथ्वीवरल्या मातीचेच प्रतीक. पण ही माती ज्ञानदेवांच्या पावन स्पर्शाने एवढी पुनीत, एवढी विशाल झाली की ती आभाळाला भिडली. म्हणून मला शांताबाईंच्या ‘ अजब सोहळा, माती भिडली आभाळा ‘ या गाण्याच्या ओळी आठवल्या. 

–क्रमशः भाग पहिला 

(कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा.)

 ©️ श्री विश्वास विष्णु देशपांडे

चाळीसगाव.

 प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी अर्धी हजामत (कटिंग) – लेखक : दत्तात्रय गणपतराव इंगळे ☆ प्रस्तुती – सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

?मनमंजुषेतून ?

☆ माझी अर्धी हजामत (कटिंग) – लेखक : दत्तात्रय गणपतराव इंगळे ☆ प्रस्तुती – सौ. उज्ज्वला केळकर ☆

एका सीमावासीय “आलूर” गावातील माझी स्वतःचीच कथा तुम्हाला सांगत आहे. आता सीमावासीय म्हणजे कर्नाटक महाराष्ट्र सीमा ही झाली राज्याची , सोलापूर उस्मानाबाद – कलबुर्गी या झाल्या जिल्ह्याच्या सीमा. तर अक्कलकोट – तुळजापूर – आळंद या तालुक्याच्या सीमेवर वसलेले उमरगा तालुका,उस्मानाबाद जिल्ह्यातील आलूर माझं गाव .

आता एवढ्या सीमा म्हटल्यावर १९७५ सालच्या काळात विविध संस्कृती व जातीभेद होताच. आमचा पारंपरिक व्यवसाय कातडी कमावणे. परंतू आमचे आजोबा हे शेती व्यवसायिक होते, तर माझे वडील एकुलते एक होते. त्यांचे शिक्षण त्याकाळी चौथीपर्यंत झाले असले तरी त्यांना शिक्षकाची नोकरी आली होती म्हणे. पण ते नोकरी नाकारून   घरची शेती पाहात असत.  त्यामुळे आमचे कुटुंब शेतकरी म्हणूनच ओळखले जायचे.

वडीलांची उठक-बैठक गावातील पोलीस पाटील शंकरराव पाटील, मलप्पा व्हट्टे सावकार, भारसिंग दादा रजपूत, दत्तोपंत कुलकर्णी, स्वातंत्र सैनिक बोळदे काका, तुक्कण्णा वाकडे सावकार  यांच्याबरोबर असायची.

आमचे वडील एकुलते एक असले तरी आम्ही मात्र पाच भाऊ दोन बहीण असे सात जण होतो. मी सर्वात लहान.  मला कळायच्या आतच मोठे भाऊ सोलापूरला नोकरी निमित्ताने राहायला गेलेले व मोठ्या बहीणीचे लग्न झालेले. ते पण सोलापूरला स्थाईक झालेले. एक भाऊ वरच्या वर्गात शाळेत आणि दोन भाऊ समवयस्क असल्याने ते एकाच वर्गात शाळेत शिकत असत. आई व एक बहीण शेतावर कामाला जात असत. त्यामुळे माझ्याकडे लक्ष देण्यास घरी कुणी नसत. त्यावेळी आमच्या घरात गावातल्या शाळेतले कांबळे गुरुजी आमच्या दोन खोल्यात सहपरिवार रहात असत . मी एकटा घरात बसलेले पाहून न राहवून त्यांनी मला माझा जन्म १९६५ चा असताना १९६२ करून पहिलीमध्ये माझे नाव दाखल केले व त्यानीच माझ्या शाळेच्या जीवनाचा प्रवास सुरू केला. तेच मला शाळेत घेऊन जात व घरी घेऊन येत.

त्यावेळी पहिली ते  चौथीपर्यंतची शाळा गावाच्या मध्यभागी होती. एका बाजूला भीमराव कुलकर्णी(गुरुजी) व नारायणराव कुलकर्णी(गुरुजी) यांचे घर तर दुस-या बाजूला अल्लाउद्दीन यांचा भलामोठा दगडी वाडा व समोर कल्लय्या स्वामी (आमच्या घरचे ) गुरु यांचे घर. आमच्या घरचे गुरु म्हणजे त्या वेळी अशी पध्दत होती की घरी कुठलेही कार्यक्रम त्यांच्याशिवाय होत नसत व शेतामध्ये  मुगाच्या शेंगा, हरब-याचा ढाळा,  ज्वारीचा  हुरडा अथवा इतर कुठलेही पीक आल्यावर त्यांना दिल्याशिवाय वडील आम्हाला धाटालाही हात लाऊ देत नसत.

पुढे कांबळे गुरुजी यांची बदली आमच्या गावावरून दुसरीकडे झाली व आता मी ही चौथीतून पाचवीत आलो.  दिवस जात होते. चौथी इयत्तेपर्यंत शाळा गावातच होती. पुढे मात्र पाचवी ते दहावी गावापासून दीड दोन किलोमीटर लांब होती. 

तसा मी लहान असताना जरा बरा दिसायचो.  हळूहळू गावातील मुलांशी मैत्री जमू लागली . राजकुमार खद्दे, रघुनाथ भांडेकर, परशुराम धोत्रे , मुकुंद क्षिरसागर , सुहास पारडे, आप्पशा मलंग,  सारंग कुलकर्णी, विजय कुलकर्णी, अशोक पाटील, विठ्ल चौधरी, नेपालसिंग रजपूत, अशोक बब्बे,  गुंडू बि-हाडे, श्रिशैल गुंडगे, मल्लु जिरोळे, अशोक बोळदे, गुर्लींग पालापूरे, अशोक कुलकर्णी, मोतीराम राठोड, राम राठोड, एम. एच. शेख हे गावातील मित्र. तर दत्तु ,अंबादास , भीम, सुभाष, सुरेश ,राजू ,नवनाथ इंगळे हे भावकी (गल्लीतील) मित्र होते. तरी प्राथमिक शाळेच्या शेजारील घरातील प्रविण कुलकर्णी व माझी चांगलीच गट्टी जमली व मी आता शाळा नसतानाही त्यांच्याच घरी राहायला लागलो . त्या काळी ब्राम्हणाच्या घरी राहणे वगैरे शिवता शिवत मानली जात असे, पण मला कोणीही कधी काही म्हणालेले आठवत नाही. कधी कधी अभ्यासाच्या निमित्ताने मुक्कामही करत होतो.

त्या काळी गावात बाराबलुतेदारी होती. शेतीच्या अवजाराची कामे लोहार ,सुतार करत असत .हणमन्त काकाच्या दुकानात बसून आम्ही हक्काने चप्पल बनवून घेत असू .

गावामधे कटींग करणारे तर होते, पण आम्हाला मात्र त्यांच्याकडे घरचे जाऊ देत नसत. त्या वेळी आमची हजामत (कटींग ) घरीच व्हायची. त्यामुळे डोक्यावर केस असूनसुध्दा व्यवस्थित नाहीत असे नेहमी वाटायचे पण इलाज नव्हता. गावातील मुले छान कटींग करुन केस विंचरुन रुबाबात फिरत असत .मला नेहमी वाटायचे की आपणही गावात कटींग करुन घ्यावी. पण मनात असूनही शक्य होत नसे. त्या काळी घरी पाहुणे आले की जाताना ते काही पैसे लहान मुलाच्या हातावर ठेवत. असे काही पैसे मी जमवले होते. मग मी विचार केला की हे पैसे देऊन आपण कटींग करुन घ्यायची.

त्यादिवशी मी घरी न सांगताच मनाचा हिय्या करुन कटींग करणाऱ्या हडपे  काकाच्याकडे गेलो . त्यावेळी त्यांच्याकडे आधीपासूनच एक गिऱ्हाइकाचे काम चालू होते. त्यांनी मला बसायला सांगितले. त्याकाळी बसण्यासाठी सोय म्हणजे एखादा दगड शोधून बसायचे  व हजामत करणा-यांचा बसायचा दगड आपल्यापेक्षा थोडा उंच असायचा. एखादी कात्री , वस्तारा , व हातमशीन, आणि पाचशे एक बारचा साबण, तांब्यात पाणी एवढी सामग्री असे .

हातातले काम संपल्यावर तोंडातली तंबाखुची पिचकारी मारत हडपेकाकांनी मला हजामतीसाठी बोलावले.

मी मान खाली घालून त्यांच्यासमोर बसलो . आधी त्यानी माझ्या डोक्याला भरुन पाणी लावले व केसावर कात्री चालवायला सुरु केली. एका बाजूचे अर्धे केस कापायचे संपत आले असतील तोच माझ्या वर्गात शिकणारा हडपे काकाचा मुलगा तिथे आला व त्याने वडलांना कानडीत विचारले, ” इंवदू याक त्यली माडलूतीरी ” (याची का कटींग करत   आहात.) व त्याने त्यांच्या कानात माझी जात सांगितली. तसे त्यांनी माझ्या अंगावर खेकसत हातातली कात्री फेकून दिली व अर्धवट झालेल्या कटींगसह मला हाकलून दिले . भिजवलेले डोके व एकीकडचे कापलेले अर्धवट केस अशातच मी रडत रडत घर गाठले . माझा हा असा अवतार बघून वडीलानी विचारपूस करुन मला शांत बसवले व माझी राहलेली अर्धी कटींग केली व पुन्हा असे न करण्याची समज दिली. मी असे काय केले की त्यानी माझी कटींग अर्धवट सोडली असेल बरे? प्रश्नाचे उत्तर कळत असूनही  माझ्या बालमनाला पटत नव्हते.

पुढे गावामध्ये कुणीतरी गायकवाड नावाचे तलाठी यांची नेमणूक झाली होती . त्यांना हा विषय समजला. मग त्यांनी गावातील नाभिक समाजाला समज दिली, की त्यांनी जातीभेद न मानता सर्वांचीच दाढी हजामत करावी . अन्यथा शेतीचे सात बारे मिळणार नाहीत . तेंव्हा कुठे आमच्या गावात सर्व समाजाची कामे सुरळीत सुरु झाली.

पण मी अर्ध्या कटींगचा एवढा धसका घेतला होता, की पुढे कटींग करण्यासाठी आमच्या गावापासून तेरा किलोमीटर चालत मुरुम येथे जाउन कटींग करुन येत असे .

लेखक : दत्तात्रय गणपतराव इंगळे

प्रस्तुती : उज्ज्वला केळकर.

 सौ उज्ज्वला केळकर मो. ९४०३३१०१७०

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170ईमेल  – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “चूक ते चूकच (क्वांटिफाय करू नका)…” – श्री श्री योगिया ☆ प्रस्तुती – श्री विनय माधव गोखले ☆

श्री विनय माधव गोखले

? मनमंजुषेतून ?

☆ “चूक ते चूकच (क्वांटिफाय करू नका)…” – श्री श्री योगिया ☆ प्रस्तुती – श्री विनय माधव गोखले ☆

आमच्या घराजवळ एक शाळा आहे. शाळेच्या बाहेर २-३ बाकं आहेत. परवा दुपारी एका मित्राची वाट बघत तिथे बसलो होतो. प्राथमिक शाळा सुटली. पालकांची, व्हॅन काकांची, रिक्षावाल्यांची, मुलांची गर्दी उसळली. निम्मे पालक पुढे ५० मीटरचा वळसा नको म्हणून माझ्या समोरून रॉंग साईडने गाड्या घालून मुलांना घेऊन गेले. झेब्रा क्रॉसिंगला कोणीच थांबत नव्हतं. ‘शाळेसमोर हॉर्न वाजवू नये’, या ऐवजी, ‘हॉर्न वाजवणं कंपल्सरी आहे’, असं वाटत होतं. १० मिनिटात परत शांतता झाली. मी बसलो होतो त्या बाकामागे ४-६ मुलं ज्यांच्या व्हॅन/पालक यायचे होते, ते शिल्लक होते. मला त्यांचं बोलणं ऐकू येत होतं.                                                  *                                               

एक म्हणाला, 

“आमचे व्हॅनकाका इतके भारी आहेत की, आज सकाळी उशीर होत होता, तर त्यांनी सरळ सिग्नल तोडला.”

दुसरा : “हे तर काहीच नाही.. आमचे व्हॅनकाका तर रोजच सगळे सिग्नल तोडतात.”

तिसरा : “आणि कसले भारी शिव्या देतात ना!”

चौथा : “अरे, माझे बाबा तर उशीर झाला ना, तर सरळ नो एन्ट्रीमधून बाईक घालतात.”

पहिला : ” माझ्या बाबांचं तर ठरलेलं आहे.. जर पोलिसांनी थांबवलं तर बाबा त्यांचं पाकीट गाडीतच ठेवतात. आईकडून एक ५०० ची नोट चुरगळून मुठीत कोंबतात आणि पाच मिनिटात पोलिसाला भेटून परत येतात.. कुठे पण पकडू देत आम्हाला.”

यापुढे मात्र मला राहवलं नाही. माझ्यातला सुज्ञ का कोण तो नागरिक जागा झाला. तसं हल्ली मी कोणालाच काही समजवायला जात नाही, तरी पण मुलांना समजवावं असं वाटतं, कारण तीच उद्याची पिढी असते… काही बदल घडवू शकणारी.                                                           

 मी मुलांकडे गेलो. आपण कुठल्यातरी चुकीच्या गोष्टी प्रमोट करत आहोत, याचा जरासुद्धा अपराधी भाव त्यांच्या चेहऱ्यावर नव्हता. त्यांनी ‘आता कोण हे काका लेक्चर द्यायला आले?’ असा लूक दिला. 

मी त्यांना म्हणालो, 

“आता गव्हर्मेंट एक नवीन रूल आणणार आहे… व्हॅनचे नंबर्स आणि जे आई/बाबांबरोबर येणाऱ्यांसाठी त्यांच्या गाड्यांचे नंबर्स मुलांच्या रोल नंबर्स बरोबर लिहून घेणार आहेत. आता सगळीकडे चौकाचौकात CCTV आहेत. त्यात रूल मोडला तर गाडीचा नंबर कॅप्चर होतोच. त्यावरून कुठल्या मुलाच्या आई/बाबांनी किंवा व्हॅनकाकांनी रूल मोडला ते रेकॉर्ड होईल. एकदा रूल मोडला की ५ मार्क्स कमी. वर्षाच्या शेवटी तुम्हाला जितके मार्क्स मिळाले त्यातून जेवढ्या वेळा तुम्हाला शाळेत सोडताना/परत नेताना रूल मोडला ते इंटू  (*) ५ इतके मार्क्स कमी आणि ते तुमचे फायनल मार्क्स! “

भीषण शांतता पसरली. सगळी मुले विचारात पडली. मला माझेच कौतुक वाटले आणि स्वतःचीच आयडिया खूप आवडली (खरं तर मला हे पटत नाही.. सगळ्याच गोष्टी कशाला मोजायला पाहिजेत.. चांगुलपणा / नियम पाळणे / देशभक्ती या काय मोजायच्या गोष्टी आहेत. पण हल्ली डेटा आणि क्वांटिटेटिव्ह या शिवाय आपण जगूच शकत नाही.. असो तो एक वेगळ्या लेखाचा विषय आहे). मी परत येऊन बाकावर बसलो. दोन मिनिटेच गेली असतील आणि ती यंग ब्रिगेड माझ्याकडे आली…  

एक : “काका, याच्याकडे भन्नाट आयडिया आहे, तो म्हणतो मी बाबांना सांगीन की, काकांच्या गाडीवरून सोडत जा म्हणजे त्याच्या चुलत भावाचेच मार्क कमी होतील.. नाही तरी फार शायनींग खातो.” 

दुसरा : “येड्या, त्यापेक्षा डुप्लिकेट नंबर प्लेट लावायची.”

तिसरा : “काका.. त्या दुसऱ्या शाळेची आमच्या शाळेशी खूप खुन्नस आहे.. समजा, त्यांच्या प्रिन्सिपॉलनी आमच्या व्हॅनकाकांना पैसे दिले आणि मुद्दाम सिग्नल तोडायला सांगितले तर म्हणजे आमच्या शाळेतल्या मुलांना कमी मार्क्स पडतील आणि आमची बदनामी होईल… तर?”

माझ्या शेजारच्या बाकावर बसलेला बोलला, “आजकालची मुलं इतकी स्मार्ट आहेत ना..”

तेवढ्यात पी-पी करत रॉंग साईडने त्यांच्या व्हॅन आल्या आणि मुले गेली. मी वाचलो. कारण त्या मुलाच्या प्रश्नाचे माझ्याकडे उत्तर नव्हते. पण हा स्मार्टपणा नक्की नाही. ८-१० वर्षांच्या त्या मुलांमध्ये हे असले विचार येतात कुठून? सगळ्यात पळवाटा शोधायच्या, फाटे फोडायचे, सारखी कुरघोडी करायची, चूक मान्य करण्याऐवजी तिचे उदात्तीकरण करायचे, इतके नकारात्मक विचार एवढ्याश्या मेंदूत येतात कुठून? आणि तेही इतक्या लगेच? मुलांची काहीच चूक नाही. ते आजूबाजूला जे ऐकतात, बघतात, वाचतात, त्यातून तर शिकतात. का त्याही पलीकडे, ही अशी नकारात्मक वृत्ती हल्ली अनुवंशिकतेतूनच त्यांच्याकडे जाते की काय कोण जाणे?

एक वेळ मार्क्स कमी करून त्यांना नियम पाळायची जबरदस्ती करता येईलही. पण त्यांच्या मनातल्या नकारात्मक, फाटेफोडू विचारांचे ट्रॅफिक कसं रुळावर आणायचं? मुलांची ही मानसिकता, नकारात्मक वृत्ती, पळवाटा काढायची सवय हे जास्ती भीतिदायक आणि काळजी करायला लावणारं आहे…. 

बाकी काही नाही जमलं, तरी याला “स्मार्टनेस” म्हणू नका आणि त्याचं कौतुकही करू नका, उदात्तीकरण करू नका. (असले मेसेजेस, रील्स, स्टोऱ्या फॉरवर्ड आणि शेअर नाही केलं तरी खूप आहे).. “चूक हे चूकच आहे” हे मान्य करा, ठणकावून सांगा, परत परत सांगा आणि उगाच चूक क्वांटिफाय करत बसू नका. कदाचित हीच बदलाची सुरूवात असेल. प्रजासत्ताक दिन येतोय, चला आपापल्यापुरती तरी सुरूवात करूया.  

✍️

योगिया

ता.क :

हा लेख लिहिला. FB वरही टाकला. कौतुकाने माझ्या बाबांना वाचून दाखवला. हसले. मी विचारलं, “कसा झालाय?” म्हणाले “छान झालाय.” 

“मग हसलात का?”

“सहजच.”

आता मी त्यांना गेली ५० वर्षे ओळखतो…

ते सहज हसणं नव्हतं. त्याला खेदाची किनार नक्कीच होती.

मी परत विचारलं, “का, काय झालं?”

ते म्हणाले, “असंही लिहू शकला असतास की, ज्या मुलांचे आई /बाबा , व्हॅनकाका नियम पाळतील त्यांना २ टक्के जास्त मार्क्स देण्यात येतील, ते कटच कशाला करायला पाहिजेत?”

खजील व्हायला झालं…! 

खरंच आमच्याच पिढीपासून हा प्रॉब्लेम झालाय…! नकारात्मक वागण्याचा/लिहिण्याचा/विचार करण्याचा!

मुद्दाम लेख एडिट करत नाहीये.. राहूदे ही बोच मनाला…! 

पण तुम्ही जर पुढे शेअर कराल, कोणाला सांगाल तर मात्र हा बदल जरूर करा.

लेखक : श्री योगिया  

संग्राहक – श्री विनय माधव गोखले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ मग मीही श्रीमंतच की ! भाग – 3 ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ मग मीही श्रीमंतच की ! भाग – 3 ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

जे गरीब आणि निराधार रूग्ण दवाखान्यात ऍडमिट आहेत आणि त्यांना जेवण आणून देणारे कोणीही नाही…. या जगात ज्यांचं आपलं म्हणावं, असं कोणीही नाही….. अशा सर्व गरीब रुग्णांना आमच्या “अन्नपूर्णा प्रकल्पामधून” आपण रोज डबे पुरवित आहोत. ….. श्री अमोल शेरेकर, या कष्टाळू दिव्यांग कुटुंबाकडून आपण डबे तयार करून घेत आहोत , आणि जिथे खरंच गरीब आणि गरजू रुग्ण आहे, अशांनाच आपण हे मोफत जेवणाचे डबे देत आहोत.  (सरसकट दिसेल त्याला आपण जेवण देत नाही) …. याचे संपूर्ण व्यवस्थापन डॉ मनीषा पाहत आहे. 

यांनाही आयुष्यात उभं करायचं आहे ….परंतु, भरल्या पोटाने दिलेला सल्ला, उपाशी पोटाला पचत नाही…!

… बघू प्रयत्न सुरू आहेत…! 

  • ज्यांच्याकडे चुली आहेत, परंतु शिधा नाही, अशा गोरगरीब आणि रस्त्यावर याचना करणाऱ्या लोकांना आपण शिधा पुरवित आहोत.  या महिन्यात जवळपास ३०० लोकांना दोन महिने पुरेल इतका शिधा आपण दिला आहे. 

यांना चिंता आहे ती भविष्याची… त्यांच्या मुलांची… ! 

मेल्यावर जाळते ती “चिता” आणि मरण्याअगोदर जाळते ती चिंता…! 

फरक फक्त एका टिंबाचा….!

  • जवळपास ६०० लोकांच्या रक्त, लघवी आणि इतर सर्व शारीरिक तपासण्या आपण रस्त्यावर आणि रेड क्रॉस हॉस्पिटल येथून करून घेतल्या आहेत. तपासण्याचे रिपोर्ट पाहून त्यांना त्याप्रमाणे वैद्यकीय सेवा रस्त्यावरच दिली आहे. .. मी त्यांना रस्त्यावर  “मोफत” दवा देतो…. ते मला “अनमोल” दुवा देतात… ! 

… इथेही फरक फक्त… उकाराचा…!  मी हा उकार घेवून मस्त जगतोय…. शप्पथ घेऊन सांगतो… मनशांती मिळवायची तर फक्त हा उकार महत्वाचा ! 

आपण आपल्या विचारात त्रस्त असतो तेव्हा असते ती “मनःस्थिती”…. दुसऱ्यांचा विचार करायला लागतो तेव्हा होते ती “नमःस्थिती ” …! 

… फक्त शब्दांची अदलाबदल करायची…? की विचारांची आणि वागण्याची??  हे ज्यानं त्यानं ठरवायचं ! 

  • रस्त्यावर पडलेले… एक्सीडेंट होऊन हात पाय मोडलेले… डोके फुटलेले…. दहा रुपयांसाठी मारामारी होऊन, भोसकाभोसकी झालेले, कॅन्सर, कावीळ झालेले असे बारा रुग्ण आपण या महिन्यात मॉडर्न हॉस्पिटल येथे ऍडमिट केले आणि या सर्वांचे जीव वाचले आहेत. 

… हे पुन्हा उठून उभे राहतील अशी आशा आहे…! 

सूर्यापासून एक शिकायचं असतं ….संध्याकाळी मावळलं तरी रोज सकाळी पुन्हा उगवायचं असतं ! 

  • कडाक्याच्या थंडीत जे गारठले आहेत, अशा रस्त्यावरच्या सर्वांना…. कान टोपी, स्वेटर, ब्लॅंकेट, घोंगडी देऊन झालं आहे. सौजन्य : डॉ राजेश केणी, गोवा.
  • आयुष्याच्या अंताला जे लागले आहेत… रस्त्यावर पडून आहेत…. असे आजी आजोबा, जग सोडून गेले तर बेवारस म्हणून नोंद होऊन ते जातील…. ना कुणाला खंत, ना कोणाला खेद ! मला हे मंजूर नाही !  आणि म्हणून, अशा अनेकांना या महिन्यात वेगवेगळ्या वृद्धाश्रमात नेऊन ठेवलं आहे. जेव्हा ते जातील, तेव्हा किमान वृद्धाश्रमातून मला फोन येईल आणि आम्ही त्यांचे मुलगा / नातू / सून म्हणून अंतिम संस्कार करू… 

… त्यांच्या आयुष्यात जगण्याची ठिणगी पेटवू शकलो नाही …  पण…. जाताना किमान अग्नी तरी देऊ…!

मनातलं काही…

भीक मागणाऱ्या / याचना करणाऱ्या अनेक लोकांच्या अंगात अनेक कला असतात, परंतु अनेक लोकांच्या अंगात कोणतीही कला आणि कौशल्य नसते…. !  ज्यांच्या अंगात कोणतेही कला आणि कौशल्य नाही अशा लोकांना हे कौशल्य शिकवावे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. 

उदा. गोधडी शिवण्याचे प्रशिक्षण, परफ्युम तयार करण्याचे प्रशिक्षण, साडीला फॉल पिको करण्याचे प्रशिक्षण, किंवा गिफ्ट आर्टिकल तयार करण्याचे प्रशिक्षण इ… इ…

प्रशिक्षण झाल्यानंतर त्या प्रकारचा ते व्यवसाय करू शकतील. पण अशा प्रशिक्षणासाठी जागा लागते.

याचना करणाऱ्या लोकांसाठी असे प्रशिक्षण केंद्र उभारणे हे माझे अंतिम स्वप्नं आहे…. यासाठी मी पुणे किंवा पुण्याजवळ पाच गुंठे जागा शोधत आहे. 

अगदीच नाही तर ८०० ते १००० स्क्वेअर फुटाचा बांधीव हॉल भाड्याने घेण्यासाठी पहात आहोत . 

महाराष्ट्र शासन आणि पुणे महानगरपालिका यांच्याकडे गेल्या पाच वर्षापासून यासाठी मागणी / विनंती / अर्ज करून मी आता थकलो आहे…. पूर्णतः हरलो आहे…! 

… असो, त्यांच्याही काहीतरी अडचणी असतीलच !

तर, कोणाच्या पाहण्यात अशी जागा अथवा हॉल असेल तर कळवावे… जेणेकरून, याचना करणाऱ्या माझ्या लोकांसाठी मला “कौशल्य विकास केंद्र” निर्माण करून, या समाजाला स्वतःच्या पायावर उभे करता येईल. 

एखाद्याला ढकलून पाडायला ताकद लागत नाही… हात धरून उठवायला ताकद लागते…! 

आपणच माझी ही ताकद आहात…! 

ज्या कामाचा मी फक्त नोव्हेंबर महिन्याचा लेखा जोखा वर सादर केला आहे, त्याला अवाढव्य आर्थिक, शारीरिक आणि मानसिक मदत लागते. 

… वरील सर्व मदत समाजाकडून मला मिळत आहे आणि त्याबद्दल मी ऋणी आहे….! 

तरीही, माझ्यासमोर असलेले खर्च आणि माझ्याकडे उपलब्ध असलेला निधी यांची सांगड कधीच बसत नाही…! 

‘तुमचे बिल पुढील महिन्यात भागवतो साहेब,’ हे हात जोडून समोरच्या व्यक्तीला सांगण्याची नामुष्की दरवेळी माझ्यावर येतेच…!

हरकत नाही, घरोघरी मातीच्या चुली…! 

पडणं म्हणजे हरणं नव्हे… उठून उभंच न राहणं म्हणजे हरणं …! 

मी पडल्यानंतर, उठून उभे करण्यासाठी तुम्हा सर्वांचेच हात पुढे येतात… आणि दरवेळी मी उभा राहतो…

पुन्हा नव्याने… नव्या जोमाने ! 

… मी नतमस्तक आहे आपणासमोर…! 

माझा प्रणाम स्वीकार करावा जी… 

— समाप्त —

(मी करत असलेल्या कामाचे सर्व फोटो आपणास दाखविण्याचा मला खूप मोह होतो… परंतु असे फोटो फेसबुक किंवा इतर सोशल मीडिया स्वीकारत नाही हा भाग एक …आणि दुसरा म्हणजे, असे फोटो {पायात अळ्या पडलेले, झोपेत कुत्र्याने पाय खाल्लेले, एक्सीडेंटमध्ये डोकं फुटलेले, हाडांचे तुकडे झालेले, ब्लेडने पोट फाडलेले, दगडाने बोट ठेचलेले इ.. इ… वाचूनच कसंसं  झालं ना ? } अनेक व्यक्तींना असे फोटो बीभत्स, ओंगळवाणे, किळसवाणे वाटतात. अनेक लोक हे फोटो पाहून कित्येक दिवस जेवू शकणार नाहीत किंवा झोपू शकणार नाहीत, याची जाणीव आहे, आणि म्हणून या कारणास्तव मी असे फोटो दाखवणे टाळत आहे.)

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ मग मीही श्रीमंतच की ! भाग – 2 ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ मग मीही श्रीमंतच की ! भाग – 2 ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

एक अपंग प्रौढ मुलगा…. याला तीन वर्षांपूर्वी व्हीलचेअर देऊन आपण व्यवसाय टाकून दिला होता… सर्व काही छान सुरू होतं , अचानक याच्या गुडघ्याला कलिंगडाएव्हढी गाठ आली… पाच नोव्हेंबर रोजी याचे ऑपरेशन करून पुन्हा याला पूर्ववत केलं आहे…. सायकल कॉलनी, क्वार्टर गेट नंबर चार समोर हा विविध वस्तूंची विक्री करत पुन्हा उठून उभा राहिला आहे. 

याच्या आयुष्यात अनेक अडचणी आल्या….. बऱ्याचदा रडून तो मला सांगत असतो… खूपदा मला वाईट वाटतं…! 

पण मी त्याला सांगून ठेवलंय, ‘ येड्या, अडचणी जिवंत माणसाला येतात…. अंत्ययात्रेसाठी तर लोक स्वतःहून रस्ता रिकामा करून देतात… तेव्हा अडचण आली तर आपण जिवंत असल्याचा जल्लोष करायचा आणि अडचणीवर लाथ मारून पुढे जायचं….!’

मुलांकडून भीक मागून घेतली की भरपूर पैसे मिळतात आणि म्हणून पालक आपल्या मुलांना भीक मागायला लावतात, शाळेत टाकत नाहीत… तरीही त्यांच्यात आणि माझ्यात असलेल्या नात्याचा उपयोग करून घेऊन, आपण साधारण ५२ मुलांना भीकेपासून सोडवलं आहे…. आपण अशा मुलांना शैक्षणिक मदत करत आहोत. (यांचे आईबाप / आजी आजोबा भीक मागतच आहेत, परंतु या मुलांची ओळख करून घेऊन, त्यांच्यातलाच एक मित्र होऊन, त्यांचा विश्वास संपादन करून त्यांना शिकण्यासाठी प्रवृत्त केले आहे) …. यात अनेक चिल्लीपिल्ली आहेत, दुसरी ते नववी पर्यंत…. 

पण येत्या काही दिवसात हाताशी येतील, अशी माझी पोरं पोरी सुद्धा आहेत….. 

१. ज्याचं संपूर्ण खानदान अजूनही भीक मागत आहे, अशा मुलाला आपण शिकवत आहोत. त्याची यावर्षीची एमपीएससी ची आणि कॉलेजची फी आपण १२ नोव्हेंबर रोजी भरली आहे. येत्या दोन वर्षात तो पीएसआय (इन्स्पेक्टर) होईल, अशी मला आशा आहे.

२. दुसऱ्या माझ्या मुलीचे आई वडील भीकच मागतात, परंतु या मुलीला सीए (चार्टर्ड अकाउंटंट) व्हायचं आहे… तिची बी कॉम थर्ड इयर ची फी आपण दहा नोव्हेंबर रोजी भरली आहे. 

३. ज्याला वडील नाहीत, परंतु आई भीक मागते, असा एक मुलगा, BSC कॉम्प्युटर सायन्स करत आहे, याची या वर्षाची कॉम्प्युटर सायन्स ची फी आपण सहा नोव्हेंबर रोजी भरली आहे. 

४. जिची आजी चिंचवड येथे भीक मागते, अशा एका माझ्या मुलीची अकरावी कॉमर्स ची फी आपण नऊ नोव्हेंबर रोजी भरली आहे. तिला प्रायव्हेट ट्युशन लावून, या प्रायव्हेट ट्युशनची फी सुद्धा भरली आहे….

५. दिवसा भीक मागून, रात्री शरीर विक्री करणाऱ्या, अशा माझ्या एका ताईच्या मुलाची आठवीची फी आपण दिनांक 22 नोव्हेंबर रोजी भरली आहे. 

६.  याच सोबत जिची आई अजूनही भीक मागते… अशा एका मुलीची एमबीए करण्याची इच्छा होती, तिला मागील वर्षी आपण MBA ला ऍडमिशन घेऊन दिलं आहे आणि आता दुसऱ्या वर्षाची फी भरून तिला पुस्तकेही घेऊन दिली आहेत. 

….. येत्या काही वर्षात इन्स्पेक्टर होणाऱ्या माझ्या मुलाला मी “जय हिंद सर” म्हणत, जेव्हा कडक Salute ठोकेन तेव्हा…. 

….. चार्टर्ड अकाउंटंट झालेल्या माझ्या मुलीच्या केबिनमध्ये आत जाताना मी, ‘May I come in madam ?’  म्हणेन तेव्हा…. 

….. BSC Computer Science झालेलं माझं कार्ट, माझ्याकडे पाहून, ‘ तुम्हाला कॉम्प्युटर मधलं काय कळतंय ?’ असं मलाच विचारेल तेव्हा…. 

….. Masters in Business Administration (MBA) कम्प्लीट झालेली माझी मुलगी, गळयात पडून, जेव्हा “व्यवहाराच्या” चार गोष्टी मलाच सांगायला लागेल तेव्हा…. 

…… तेव्हा…. हो, तेव्हाच ….. “बाप” म्हणून खऱ्या अर्थाने माझा जन्म होईल !…. बाप म्हणून माझ्या जन्माला येण्याची… त्या दिवसाची मी वाट पाहतोय…. !

ज्या आज्यांना भीक मागायची नाही … काम करायचे आहे … ‘त्या आमास्नी कायतरी काम दे रं बाबा ….’ असं अजीजीने विनवतात…..पण अशा निरक्षर आणि कमरेत वाकलेल्या आज्यांना मी तरी काय काम देणार ? 

आणि म्हणून, माझे आदर्श, आदरणीय श्री गाडगे बाबांच्या प्रेरणेतून, अशा आज्यांबरोबर मी आणि मनीषा हातात खराटा घेऊन पुणे शहरातील कितीतरी अस्वच्छ जागा स्वच्छ करत आहोत…. आणि या बदल्यात मला मिळणाऱ्या डोनेशनमधून अशा आज्यांना पगार देणे सुरू केले आहे. या आज्यांची टीम तयार केली आहे या टीमला नाव दिले आहे “खराटा पलटण” ! 

…. ‘मला, मनीषाला आणि आमच्या खराटा मारणाऱ्या चाळीस आज्यांना, पुणे महानगरपालिकेने, “स्वच्छता अभियान” चे ब्रँड अँबेसिडर केले आहे… हे काहीतरी आक्रीतच म्हणायचं … ! 

— क्रमशः भाग दुसरा 

 © डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ मग मीही श्रीमंतच की ! भाग – 1 ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ मग मीही श्रीमंतच की ! भाग – 1 ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

पैशाने खरेदी करता येत नाहीत… अशा गोष्टी ज्याच्याकडे जास्त, तो खरा श्रीमंत ! 

ज्याच्या घरात अजूनही वृद्ध आई बाबा राहतात तो खरा श्रीमंत…. ! 

निसर्गाने आणि समाजाने, याचना करणाऱ्या लोकांसाठी काम करण्यासाठी माझी निवड केली…. आणि त्यामुळे या कामात मला किमान दोन-तीनशे आई, दोन तीनशे बाबा, दोन तीनशे आजोबा, दोन तीनशे आज्या मिळाल्या आणि या वयात मला शे दोनशे पोरंही झाली…. !

मग मीही श्रीमंतच की  ! 

उन्हात बसलो असताना आजीने डोक्यावर धरलेला पदर,  घामाच्या धारा निथळत असताना एखाद्या आजीने चार बोटं बुडवून आणलेल्या उसाच्या रसाचा ग्लास, शिळ्या चपातीचा काला करून भरवलेला घास, ८० वर्षाच्या, रस्त्यावर पडलेल्या आजीला गमतीने काहीतरी चिडवल्यानंतर,  ‘मुडद्या तुला हाणू का चपलीनं ?’  म्हणत तिने घेतलेला गालगुच्चा…  माझ्या चेहऱ्यावरचा घाम पुसणारा तो मळलेला…. तरीही सुगंधी पदर…. मी हातात घेतलेले सुरकुतलेले मायेचे हात…!  

….. पैसे खर्च न करता जमा झालेल्या या मौल्यवान गोष्टी मी रोज माझ्या झोळीत घरी घेवून येतो. 

रात्री झोपण्याआधी दिवसभरातल्या आठवणींची ही झोळी उघडून बघतो आणि जाणीव होते… जगातला सर्वात श्रीमंत मीच असेन ! …. माझ्यावर विश्वास ठेवून श्रीमंत होण्याची ही संधी समाज म्हणून आपणच मला दिली आहे. 

आजवरच्या कामात एक लक्षात आलं, आपण स्वतःसाठी काही केलं की होते ती “प्रगती”…. परंतु स्वतः सोडून जेव्हा आपण इतरांसाठी काहीतरी करायला लागतो, त्यावेळी होतो तो “विकास”… ! 

स्वतःच्या प्रगती बाहेर येऊन ….दुसऱ्यांचा विकास व्हावा ही मनोमन इच्छा धरणाऱ्या… आपल्या सर्वांच्या विचारांना माझा साष्टांग नमस्कार … !!! 

* रस्त्यावर राहणारे एक पती-पत्नी सन्मानाने राहू इच्छितात. परंतु व्यवस्था त्यांना माणूस म्हणून जगू देत नाही. तीन नोव्हेंबर रोजी या पती-पत्नीला फुल विक्रीचा व्यवसाय आपण टाकून दिला आहे.  पत्नी अपंग आहे, तिला व्हीलचेअर दिली आहे. हार आणि गजरे तयार करून /विकून  दोघेही पती पत्नी सन्मानाने जगत आहेत. 

….. तिकडे ते फुलं विकत आहेत आणि इकडे माझे हात सुगंधी झाले…! 

* “ती” पलीकडे बसलेली ताई दिसते का तुम्हाला ? हां तीच…. ती खरं तर अपंग आहे…. ! या जगात तिला कोणीही नाही…. रस्त्यावर राहते ….अनेक गिधाडं तिच्यावर टपून आहेत…. ! दुर्दैव असं …. की ती उठून उभी राहू शकत नाही….  ती पळणार कशी ? 

आता थोडसं त्या बाजूला जाऊ…. ही पाहा, ही दुसरी ताई….. हिची सुद्धा अवस्था तशीच… ही सरपटत घसरत एखाद्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाते…

ही तिसरी ताई बघितली ? हिची आई ८० वर्षाची असेल… काम करण्याची तयारी आहे, परंतु कामं मिळत नाहीत… सोपा उपाय म्हणून ती आता भीक मागायला लागली आहे. 

आता थोडं इकडे यावं…. ही चौथी ताई बघितली ?

ही पूर्णतः अंध आहे ! पूर्वी रेल्वेमध्ये चिक्की विकायची….  कोविडनंतर तो व्यवसाय बंद पडला

…… या चौघी सुद्धा तरुण आहेत ! रस्त्यात एखादा घास पडला असेल तर तो उचलण्यासाठी किमान ५० कावळे टपून असतात..,… या चौघींच्या आसपास फिरत असलेले हे कावळे बघताय तुम्ही ? 

यातील  तिघींना व्हीलचेअर आणि कुबड्या देऊन, वजन काटा दिला आहे, चौथ्या ताईला भाजी विक्रीचा व्यवसाय टाकून दिला आहे. वजन काट्यावर, वजन करून लोक यांना पैसे देतात, भाजी घेतात….

या चौघीही आता परावलंबी नाहीत… स्वावलंबी झाल्या आहेत … साध्या अशा एका चाळीमध्ये का होईना, परंतु रस्त्यावर न राहता घरामध्ये राहत आहेत… ! 

… काठी न वापरता कावळ्यांना हुसकावून लावलं आहे आणि चारही  “चिमण्या” आता घरट्यात सुरक्षित आहेत ! 

* पाचवी एक ताई …. घरात कोणाचा आधार नाही …  तीन मुले आहेत…. शिवणकाम येते, परंतु भांडवल नाही. 

हसबनीस नावाचे माझे ज्येष्ठ स्नेही, यांनी या ताईला स्वतःकडील शिलाई मशीन दिले आहे, आता ही ताई साडीला फॉल पिको वगैरे करून स्वतःच्या संसाराला हातभार लावत आहे. 

…. फाटलेला संसार ती धाग्या धाग्याने पुन्हा विणत आहे. 

– क्रमशः भाग पहिला.

 © डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares