मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ श्री बालाजीची सासू… ☆ सौ कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये ☆

सौ कुंदा कुलकर्णी

??

☆ श्री बालाजीची सासू… ☆ सौ कुंदा कुलकर्णी ☆

श्री बालाजीची सासू, मग सासरा, नवरा, मग दीर, नणंद, आई, बाबा, भाऊ ,बहीण, मैत्रिणी, सखा , मामा, मामी, मावशी, आजी, आजोबा, पणजी, पणजोबा, खापर पणजी, खापरपणजोबा….. 

कसले लाडू, कसल्या वड्या, कसल्या भाज्या, कसल्या उसळी, कसले मुरंबे, कसले चिवडे, कसल्या चकल्या, कसली शेव ,कसले वेफर्स? 

….. हादग्याची खिरापत ओळखण्यासाठी असा शॉर्टकट आम्ही मांडत असू. पण एखादी सुगरण सांगे नाऽऽऽऽही.

मग गोड की तिखट?… तळलेले की भाजलेले?… कुठली फळं आहेत का?…. बेकरीचे पदार्थ आहेत का?…  

अशा तहाच्या वाटाघाटी सुरू व्हायच्या. चुळबुळ चुळबुळ सुरु व्हायची. पण आता उत्कंठा शिगेला पोचल्यानंतर सगळ्याजणी हार मानायच्या.

“हरलो म्हणा, हरलो म्हणा”. विजयी मुद्रेने आणि उत्फुल्ल चेहऱ्याने यजमानीणबाई डबा घेऊन उभी असे. पण डब्याचं झाकण उघडण्यापूर्वी पुन्हा एकदा कन्फर्म करत असे.

१) लाह्याच्या पिठाचा उपमा कुणी म्हटलंय का?

२) फुटाणे कुणी म्हटलंय का?

३) गुलगुले कुणी म्हटलंय का?

४) शेंगोळी कुणी म्हटलंय का?

५) ढोकळा कुणी म्हटलंय का? 

किंवा एखादी गाणं म्हणायची….. ” हरलीस काय तू बाळे? गणगाची उसळ ही खुळे.”

मग आम्ही सगळ्या “खुळ्या”आनंदाने त्या खिरापतीला न्याय द्यायचो. डबा उघडला जायचा. सर्वांना खिरापत मिळायची. त्यावेळेला द्रोण, वाट्या, चमचे, डिश यांचे फॅड नव्हते. प्रत्येकीच्या तळहातावर चमचाभर खिरापत घातली जायची. तेवढ्यानेही आमचे समाधान व्हायचे. सगळेच मध्यमवर्गीय. घरात एकटा मिळवता आणि सात आठ  खाणारी तोंडे. तुटपुंज्या पगारात भागवताना नाकी नऊ येत. पण तरीही हादग्याची खिरापत केली जायचीच. सगळीकडे खिरापत ” परवडणेबलच  ” असायची. 

श्री बालाजीची सासू याचा अर्थ खालील प्रमाणे….. 

श्री = श्रीखंड,

बा = बासुंदी, बालुशाही

ला = लाडू, लापशी, लाह्या

जी = जिलेबी

चि = चिवडा, चिरोटे

सा = साटोरी, सांजा, साळीच्या लाह्या

सू = सुतरफेणी, सुधारस, सुकामेवा … वगैरे 

त्याचप्रमाणे श्री बालाजीच्या इतर नात्यांवरून पदार्थ ओळखायचे….. 

उदा. भाऊ.. भा= भातवड्या (तळलेल्या किंवा भाजलेल्या),भात, भाकरी…… अक्षरशः फोडणीचा भात ,भाकरी यांना सुद्धा खिरापतीचा मान असायचा. कुणीच कुणाला नावं ठेवत नसे. ओळखण्याचा आनंद आणि हादग्याचा प्रसाद म्हणून गट्टम करायचा.

ऊ = उंडे, उपासाचे पदार्थ. एका केळ्याचे, रताळ्याचे, काकडीचे, छोट्या पेरूचे दहा तुकडे करून एक एक तुकडा हातावर ठेवला जायचा…….. खिरापत कोणतीही असो.  ओळखण्याच्या आनंदानेच पोट भरून जात असे.

मग आमचा घोळका पुढच्या घराकडे निघायचा.

उगारला आम्ही चाळीतले सगळे मध्यमवर्गीय..  घरोघरी असा हादगा साजरा करत असू. भिंतीवर एक खिळा मारून हादग्याचा कागद लावत असू. त्या रंगीत चित्रात समोरासमोर तोंड करून दोन हत्ती उभे असायचे. दोघांच्या सोंडेत माळा धरलेल्या असायच्या. त्याला सोळा फळांची माळ घातली जायची, त्यात भाज्या देखील असायच्या.  

१६ फळं उगारसारख्या खेडेगावात मिळणं मुश्किल. बंगल्यातल्या मुलींच्या घरात फळझाडे भरपूर असायची. बिन दिक्कत आम्ही तोडून आणत असू. हातातली काचेची फुटकी बांगडी विस्तवावर धरून ठेवली की ती वाकडी व्हायची. मग त्यात शेतातली ताजी भाजी म्हणजे वांगी, दोडका, कारली, मिरची, काकडी, भेंडी, ढबू मिरची अशा काही भाज्या  त्यात बसवायच्या. हत्तींना रोज ताज्या फुलांचा हार घातला जायचा. त्यासाठी दोन्ही बाजूला खिळे मारलेले असायचे. घरोघरी हादगा रंगायचा. आमंत्रणाची गरजच नसायची. सगळ्यांनी सगळ्यांकडे जायचेच. फेर धरायचा. मध्ये एक पाट ठेवून त्यावर हत्तीचे चित्र अंबारीसकट काढायचे. हळद, कुंकू, फुलं वाहून सगळ्यांनी पारंपारिक गाणी म्हणायची. पहिले दिवशी एक ,दुसरे दिवशी दोन अशा चढत्या क्रमाने १६ व्या दिवशी १६ गाणी म्हणायची. मग खिरापत ओळखायची. हादगा समाप्तीचा मोठा समारंभ असायचा. हादग्याच्या सगळ्या मुली, शिवाय त्यांच्या आयांना देखील आमंत्रण असायचे. घागरीत  पातेल्यात खिरापत केली जायची. सर्वांनी पोटभर खावे अशा इच्छेने आग्रह करून वाढले जायचे. ती चव, ती तृप्ती वर्षभर पुरायची. मग पुढच्या वर्षी पुन्हा नव्याने सगळा खेळ रंगायचा.

आता सर्वत्र आर्थिक सुबत्ता आली. पण वेळेअभावी एकच दिवस हादगा किंवा भोंडला खेळला जातो. पण खिरापत ओळखण्याची मजा आजही वेगळा आनंद देऊन जाते. आता घरोघरी चढाओढीने पदार्थ केले जातात. गुगलवर एका क्लिकवर अनेक अनोख्या खिरापतींची रेसिपी मिळते.  लहानपणीची “श्री बालाजीची सासू” आता सुधारक पद्धतीने आकर्षक डिशमध्ये मिळते. आम्हा महिलांना तोच आनंद पुन्हा मिळतो.

© सौ. कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये

क्यू 17,  मौर्य विहार, सहजानंद सोसायटी जवळ कोथरूड पुणे

मो. 9527460290

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ नवरात्र… ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? मनमंजुषेतून ?

☆ नवरात्र… ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

नवरात्र —  सगळीकडे चैतन्याची,उत्साहाची उधळण. देवीचं अस्तित्व हे मन प्रसन्न करणारं, शक्ती प्रदान करणारं. ह्या नवरात्रीतील नऊ दिवसांच्या निमित्ताने वेगवेगळ्या देवींचे मुखवटे, त्या मुखवट्यांवरील तेज क्षणात नजरेसमोर झळकतं. निरनिराळी पीठं असणाऱ्या मखरातील देवींची रुपं आणि अगदी रोजच्या आयुष्यात सहवासात येणाऱ्या चालत्या बोलत्या हाडामासाच्या स्त्रीशक्तीची रुपं आठवायला लागतात. ह्या नवरात्रीच्या चैतन्यमय नऊ माळाआपल्याला चैतन्य, उत्साह ह्यांचं वाण देतांनाच खूप काही शिकवतात सुध्दा.

ह्या नवरात्रीच्या निमित्ताने वेगवेगळ्या देवी- म्हणजेच वेगवेगळ्या शक्तींची आठवण होते. ह्या शक्ती आत्मसात करण्यासाठी मनात नानाविध विचार, योजना आकार घ्यायला लागतात.

सगळ्यात पहिल्यांदा, ह्या शक्ती आपण आत्मसात करुच शकणार नाही असं वाटायला लागतं. पण लगेच     “ प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे ” ह्या म्हणीनुसार  ‘आपण करून तर बघू. पूर्ण अंगिकारता नाही आले तरी निदान काही तरी तर निश्चितच हाती लागेल ‘  हा सकारात्मक विचार मनात बाळसं धरु लागला.

पहिल्यांदा, आपण आपल्यात चांगले बदल हे कोणी मखरात बसविण्यासाठी वा आपला उदोउदो करण्यासाठी करावयाचे नसून ते फक्त आणि फक्त आपल्या सर्वांगीण विकासाकरीता,आपल्यात सकारात्मक जागृतता येण्याकरिता करावयाचे, हे आधी डोक्यात फिट केले. त्यामुळे आपल्यातील चांगले बदल हे कोणाच्या निदर्शनास नाही आले तरी चालतील पण आपलं स्वतःचं मन स्थिर झालं पाहिजे. फळाची अपेक्षा न करता फक्त सत्कर्म करणे ह्याकडे आपला कल झुकला पाहिजे, आणि  हा बदल औटघटकेचा न ठरता कायमस्वरूपी  झाला पाहिजे यावर कटाक्ष राहिला पाहिजे, हे मनाशी ठरविले.

सगळ्यात पहिल्यांदा अष्टभुजादेवी आठवली. सतत उन्नतीकरिता आठ हात वापरुन कामाचा उरका पाडणारी,अष्टावधानी होऊन बारीकसारीक गोष्टींकडेही लक्ष पुरविणारी–  ही अष्टभूजा तर आपण व्हायचं हे ठरवलं,  पण संसार,नोकरी ह्यावरची तारेवरची कसरत सांभाळतांना,आठ आठ हातांनी काम करतांना आपली दमणूक होऊ द्यायची नाही हे पण ठरविलं. ह्या सगळ्या जबाबदा-या हसतहसत आनंदाने पार तर पाडायच्या, पण त्या पार पाडतांना आपणच आपली स्वतःची काळजी घेऊन आपलं मनस्वास्थ्य आणि प्रकृतीस्वास्थ्य पण जपायचं, हा पण मनाशी निश्चय केला.

दुसरी देवी आठवली सरस्वती, म्हणजेच बुध्दीची देवता. ह्या देवीकडून चिकाटीने  ज्ञान  मिळवायचं. कारण दरवेळी ह्या देवीला नजरेसमोर ठेऊन उघड्या जगाकडे दृष्टी टाकली तर आपण जे शिकलो त्याच्या कित्येक पटीने जास्त शिकायचं अजून शिल्लकच आहे ह्याची जाणीव होते. सरस्वतीदेवीकडे बघून अजून एक गोष्ट प्रकर्षांने जाणवली ती म्हणजे आपल्याला आत्मसात झालेलं ज्ञान, कला, ही निस्वार्थ हेतूने सगळ्यांमध्ये वाटली तरच त्याचा चांगला विनियोग होईल. त्यामुळे ह्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावतांना, म्हणजेच देतांना वा घेतांना हात आखडता राहणार नाही ह्याची खबरदारी घ्यायची हे लक्षात आलं. 

मग आठवली देवी अन्नपूर्णा. खरचं सगळ्यांना तृप्त करणारी ही अन्नपूर्णा म्हणजे शक्तीचा एक अद्भुत चमत्कार. ही अन्नपूर्णा होतांना एक मात्र ठरविलं- आपल्या ह्या शक्तीचा वापर खरंच गरज असणाऱ्यासाठी आधी करायचा. ओ होईपर्यंत आकंठ खाऊन झालेल्यांवर आपली शक्ती खर्च करण्यापेक्षा भुकेल्यावर,गरजूंवर ह्या  शक्तीचा वापर करण्याला प्राधान्य द्यायचं. आपली ही शक्ती आपल्या लोकांसाठी, घरच्यांसाठी कामी आणायची, विशेषतः लेकाला घरचंच अन्न गोड लागावं, बाहेरचे अन्न, हॉटेलच्या डिशेस ह्यांनी पैशाचा चुराडा करून प्रकृतीची हेळसांड करुन घेण्यापेक्षा घरच्या अन्नाला मुलांनी प्राधान्य द्यावं ह्याकडे मी कटाक्षाने लक्ष दिलं पाहिजे, तरच ह्या अन्नपूर्णेच्या शक्तीला पूर्णत्व येईल. नाईलाजास्तव बाहेरचं अन्न खावं लागणं आणि घरी असतांना चोचले पुरविण्यासाठी बाहेरचं अन्न मागवून खाणं ह्यात जमीन अस्मानाचा फरक असतो.

मग दुर्गा, महिषासुरमर्दिनी आठवली– सगळ्या संकटांना हिमतीने तोंड देणारी, संकटकाळी धावून जाणारी, तितक्याच तीव्रतेने आपल्यावर होणारा अन्याय सहन. न करणारी. 

आणि मी  मनापासून एक बँकर, एक शिक्षक असल्याकारणाने आठवली आर्थिक डोलारा सांभाळणारी लक्ष्मीदेवी. धनाचा संचय तर करणारी, पण त्याचबरोबर त्याचा अपव्यय न होऊ देणारी, काटकसरीत धन्यता मानणारी, पण खरोखरच्या गरजा भागवतांना मागे पुढे न पाहणारी, भवितव्यासाठी पैसा जमवितांना त्याची लालसा मात्र न करणारी.

नवरात्राची पहिली माळ जिच्यासाठी असते ती शैलपुत्री पार्वती.  यक्षपुत्री देवी सती आणि महादेव ह्यांच्या अपमानाने क्रोधीत आणि व्यथित झालेली देवी सती देहत्यागासाठी तयार होते. देह नश्वर असल्याने तो विलीन होतो, परंतू आत्मा मात्र हिमालपुत्री म्हणजेच शैलपुत्रीच्या रुपाने परत येतो. “ देह नश्वर आणि आत्मा अमर “  हे ज्ञान, ही शिकवण, दुर्गेच्या नऊ रूपांपैकी पहिलं रुप असणाऱ्या शैलपुत्री पार्वती हिच्याकडून शिकण्यासारखी.. दुर्गेच्या नऊ रूपांपैकी आणखी एक रुप म्हणजे देवी ब्रह्मचारिणी. भगवान शिव ह्यांचा पतीरुपात सहवास घडावा ह्यासाठी देवी ब्रह्मचारिणी हिने वर्षानुवर्षे बिल्वपत्र वाहून, उपवास करून भगवान शिवाची आराधना केली आणि आपल्या निरंतर तपस्येने शिवाला प्रसन्न केले. म्हणूनच मनःपूर्वक तपस्येचा दाखला म्हणजे हे देवी ब्रह्मचारिणी, दुर्गेचे दुसरे रुप. देवीपुराणानुसार देवी ब्रम्हचारिणी नित्य तपस्येत आणि आराधनेत लीन असल्याने तिचे तेज उत्तरोत्तर वाढत गेले अशी आख्यायिका आहे. त्या तेजामुळे त्यांना गौरवर्ण व तेज प्राप्त झालं असं म्हणतात. ब्रम्हचारिणी हा शब्द संस्कृतच्या दोन शब्दांपासून बनला आहे.ब्रह्म  ह्याचा अर्थ ” घोर तपस्या ” आणि “चारिणी”चा अर्थ आचरण करणे,अनुकरण करणे. म्हणूनच देवी ब्रह्मचारिणी हिच्या एका हातात कायम उपासना करणारी ” जपमाळ ” , तर दुसऱ्या हातात कधीही कुठल्याही त्यागासाठी तयारीत असल्याचे प्रतीक म्हणून  कमंडलू  असतं. योग्य अशा एखाद्या गोष्टीचा ध्यास घ्यावासा वाटला तर तो किती मनापासून घ्यायला हवा, त्यासाठी एखादी तपस्या करावी तसे किती प्रयत्न आणि कष्ट घ्यायची तयारी असायला हवी, आणि त्यासाठी कुठल्याही त्यागासाठी मन कसे तयार असायला हवे हेच शिकवणारी ही देवी ब्रह्मचारिणी. 

ह्या सगळ्यांमध्ये स्वतः ला विसरून वा वगळून चालणारच नाही. अशी सगळी देवींची अनेक रुपे डोळ्यासमोर फेर धरुन नाचू लागली आणि त्यांच्यातील सगळे सद्गुण हळूहळू का होईना अंगिकारायचे ठरविणारे हे माझे आजचे रुप मलाच खूप भावून गेलं, स्वतःवर पण प्रेम करायला शिकवून गेलं. 

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ नवरात्र आणि रत्नागिरीच्या किल्ल्यावरील भगवती देवी… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

??

☆ नवरात्र आणि रत्नागिरीच्या किल्ल्यावरील भगवती देवी… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

बालपणीच्या काही आठवणी या कायमच्या मनामध्ये रुतून राहतात. आज पेठ किल्ल्यावरील भगवती मंदिराचा फोटो पाहिला आणि रत्नागिरीच्या आठवणी जाग्या झाल्या. नवरात्र सुरू झाले की हमखास भगवती देवीची यात्रा आठवते. या देवीचे मंदिर ज्या किल्ल्यावर आहे. त्याचे  ऐतिहासिक नाव जरी ‘रत्नदुर्ग’ असले तरी आमच्या लेखी तो ‘पेठ किल्ला’ आहे. एरवी शांत निवांत असलेल्या त्या किल्ल्यावर वर्दळ दिसे ती नवरात्रातच! त्या किल्ल्याच्या एका टोकावर दीपग्रह होते.तिथून समुद्राचे दर्शन होई.समुद्रातील दीपग्रह, त्यावरील पडाव, मोठ्या बोटी आणि निळा आसमंत पाहताना खूपच छान वाटत असे. किल्ल्याच्या दुसऱ्या टोकावर भगवती देवीचे मंदिर होते. या ठिकाणी यात्रेनिमित्त लहानपणी जाणे होत असे.

गाभूळलेल्या चिंचेसारख्या आंबट गोड आठवणी ! शाळेत असताना नवरात्रात भगवतीच्या यात्रेला जाणे हा एक कार्यक्रम असे. पूर्वी वाहने कमी होती आणि रस्ता ही साधा होता. किल्ल्यावर चढून जायचे म्हणजे बराच वेळ लागत असे. नवरात्रात सकाळी लवकर उठून घरातील मोठ्या मंडळींबरोबर चालत जाऊन भगवती देवीचे दर्शन आणि तेथील जत्रा अनुभवात होतो. जरा मोठे झाल्यावर मैत्रिणींबरोबर जाण्यात अधिक मजा येई. जाताना वाटेत काकड्या घेणे, कोरडी भेळ घेणे आणि गप्पा मारत हसत खेळत किल्ला चढणे अशी मजा असे.

त्यावेळची एक आठवण म्हणजे बुढ्ढी के बाल ! गुलाबी रंगाचे ‘बुढ्ढी के बाल’ एका मोठ्या काचेच्या पेटीत घेऊन तो बुढ्ढी के बाल वाला फिरत असे, पण घरचे लोक ते चांगले नसते म्हणून घेऊ देत नसत आणि ते देत नसत म्हणून जास्त अप्रूप वाटत असे. किल्ल्यावर एक सिनेमावाला चौकोनी खोके समोर घेऊन उभा असे आणि तो सिनेमातील काही फिल्म दाखवत फिरत असे. अर्थात तिथेही आम्ही कधी गेलो नाही ! आम्ही फक्त मंदिरात दर्शन आणि भेळेची गाडी या दोनच गोष्टी पाहिल्या होत्या.

किल्ला चढताना वाटेत भागेश्वराचे मंदिर होते. त्याचा जिर्णोद्धार भागोजी कीर यांनी केला होता. थांबण्याचा पहिला टप्पा तिथेच असे. ते मंदिर आधुनिक पद्धतीने छान बांधलेले होते. तिथून पुढे मोठा चढ चढून देवीच्या मंदिरापर्यंत जाता येई. रत्नदुर्ग किल्ल्याला ऐतिहासिक महत्त्व होते. पण गावापासून लांब असल्याने फक्त नवरात्रातच आवर्जून जाणे होई. पावसाचे चार महिने संपल्यावर सगळीकडे भरभरून हिरवागार निसर्ग दिसत असे. जांभळी पिवळी रान फुले किल्ल्यावर पसरलेली दिसत. सूर्याची किरणे अजून तरी तापायला लागलेली नसत. त्यातच तिथल्या पावसाची एक गंमत असे. नवरात्राच्या पहिल्या एक-दोन दिवसात पाऊस पडला की तो माळेत सापडला असेच म्हणत. त्यामुळे नऊ दिवस आता रोज थोडा तरी पाऊस पडणारच असे म्हटले जाई. अर्थात पाऊस आता बेभरवशाचा झाला आहे. तो कधी कुठे येईल सांगता येत नाही. आम्हाला अर्थातच त्या रिमझिम  पावसात भिजायला आवडत असे. किल्ल्यावर जत्रेमध्ये हौशे,नवसे आणि गवसे असे सगळ्या प्रकारचे लोक भगवतीला येत असत. गावची जत्रा असल्यामुळे खेळण्याचे स्टॉल्स, खाऊची दुकानं, नारळ, उदबत्ती, बत्तासे, साखरफुटाणे, यांची दुकाने अशी अनेक प्रकारची तात्पुरती दुकाने असत.

आम्ही जत्रेत फिरून थोडाफार खाऊ घेत असू.  बरोबर आणलेले डबे खाल्ले जात ! बाहेर विकत घेऊन खाण्याचे ते दिवस नव्हते. सातव्या माळेच्या जत्रेचे विशेष महत्त्व असे. त्यादिवशी शाळा लवकर सुटायची, तोच मोठा आनंद असे. पुढे कॉलेजला गेल्यावर आनंदाचे विषय बदलले. किल्ल्यावर जाता येताना पिपाण्या वाजवणे, टिकटिकी घेणे, फुगे घेणे, दंगा करणे, यासारखे तरुणाईचे उद्योग चालू असत ! तेव्हा ती पण एक मोठी मजा होती. आज भगवती मंदिराचा फोटो व्हाट्सअप वर पाहिला आणि पुन्हा एकदा त्या जत्रेतील पाळण्यातून वर- खाली वेगाने माझे मन भूतकाळात फिरून आले.

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मुलगी…अनामिक ☆ प्रस्तुती – सौ.स्मिता पंडित ☆

??

☆ मुलगी… ☆ प्रस्तुती – सौ.स्मिता पंडित ☆

वडिलांनी आपल्या मुलीचा साखरपुडा केला. होणारा नवरामुलगा सुस्वभावी व चांगल्या घरचा, त्याच्या आई-वडिलांचा स्वभाव देखील घरकुलाला शोभावा असाच होता. वडिलांना आनंद होताच पण मुलीला मिळणा-या चांगल्या सासरवरुन त्यांच्या डोक्यावर असलेल्या अपेक्षांचं ओझं कमी झाले होते.

एक दिवस लग्नाआधी मुलाकडून मुलीच्या वडिलांना त्यांच्याकडे जेवणाकरिता बोलविण्यात आले होते.

वडिलांची तब्येत बरी नव्हती, तरी पण त्यांना तब्येतीचे कारण मुलीच्या होणा-या सासरकडच्यांना देता आले नाही.

मुलाकडच्यांनी मोठ्या आदरसत्काराने त्यांचं स्वागत केलं. मग मुलीच्या वडिलांकरीता चहा आणण्यात आला.

मधुमेहामुळे वडिलांना साखर वर्ज्य करायला आधीच सांगण्यात आले होते. परंतू पहिल्यांदाच लग्नापूर्वी मुलीच्या होणा-या सासरकडून आलेल्या बोलावण्यामुळे आणि त्यांच्या घरात असल्यामुळे वडिलांनी गपगुमान चहाचा कप हातात घेतला.चहाचा पहिला घोट घेताच त्यांना आश्चर्य वाटले…! चहात साखर अजिबात नव्हती. शिवाय त्यात वेलदोड्याचा सुगंधही येत होता. त्यांनी विचार केला की, ही लोकंदेखील आपल्या घरच्या सारखाच चहा घेतात.

दुपारचं जेवण– ते सुद्धा घरच्यासारखंच होतं. जेवणानंतर त्यांना थोडा आराम करता यावा म्हणून डोक्याखाली दोन उशा व पातळ पांघरूण देण्यात आलं. उठल्यावर त्यांना बडीशेप घातलेलं पाणी पिण्यास देण्यात आलं .

मुलीच्या होणा-या सासरहून पाय काढतांना वडिलांना त्यांच्या आदरातिथ्यात घेतलेल्या काळजीबद्दल विचारल्याशिवाय राहवलं नाही. त्यांनी मुलाकडच्यांना याविषयी विचारले, ” मला काय खायचं, प्यायचं, माझ्या तब्येतीला काय चांगलं हे, आपल्याला एवढया उत्तमप्रकारे कसे काय माहिती ??” यावर मुलीच्या होणा-या सासूबाई म्हणाल्या, ” काल रात्रीच तुमच्या मुलीचा फोन आला होता. ती म्हणाली माझे सरळ स्वभावी बाबा काही म्हणणार नाहीत. त्यांच्या तब्येतीकडे बघता आपण त्यांची काळजी घ्यावी ही विनंती.” हे ऐकून वडिलांचे डोळे पाणावले होते. 

वडील जेव्हा घरी पोहचले तेव्हा समोरच घराच्या भिंतीवर असलेल्या त्यांच्या स्वर्गवासी आईच्या तसबीरीवरुन त्यांनी हार काढून टाकला. हे पाहून पत्नी म्हणाली, ” हे आपण काय करता आहात ?? “

यावर डोळ्यात अश्रू आणीत मुलीचे बाबा म्हणाले, ” माझी काळजी घेणारी आई या घरात अजूनही आहे, ती कुठेच गेलेली नाही… ती या लेकीच्या रुपात याच घरात आहे.”

जगात सर्वच म्हणतात ना, मुलगी ही परक्याचे धन असते…. एक दिवस ती सोडून जाईलचं. पण मी जगातील सर्व आई-वडिलांना सांगू इच्छितो की, मुलगी कधीच तिच्या आई-बापाच्या घरातून जात नसते. तर ती त्यांच्या हृदयात राहते. आज मला अभिमान वाटतो आहे की, मी एका ‘ मुलीचा बाप ‘ आहे..!!”

लेखक – अज्ञात

संग्राहिका – सौ. स्मिता पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ रामरक्षेचा आणि संस्कृत उच्चारांचा प्रभाव… श्री.संतोष गोविन्द जोशी ☆ प्रस्तुती – सुश्री वीणा छापखाने ☆

??

रामरक्षेचा आणि संस्कृत उच्चारांचा प्रभावश्री.संतोष गोविन्द जोशी ☆ प्रस्तुती – सुश्री वीणा छापखाने ☆

माझे एक मित्र होते, सुनील जोशी. होते म्हणजे दुर्दैवाने आज हयात नाहीत. पण त्यांच्याबाबतीत प्रत्यक्ष घडलेली हकीकत सांगतो.

पूर्वी आम्ही ज्या सोसायटीत रहात होतो, त्या रस्त्याच्या सुरूवातीच्याच सोसायटीत ते रहायचे. त्याच सोसायटीच्या तळघरातील एका हाॅलमधे ते आणि त्यांची पत्नी असे दोघेजणं संस्कृतच्या शिकवण्या घ्यायचे. नंतर आम्ही काही काळाकरता गंगापूर रोडला रहायला जाऊन आमचं घर बांधून झाल्यावर परत कामठवाड्यात आलो. तोपर्यंत ते इंदिरानगरला फ्लॅटमधे रहायला गेले होते. त्यामुळे बर्‍याच वर्षांत भेट नव्हती. ५-६ वर्षांपूर्वी आमच्यामागेच श्री. योगेशजी मांडे रहातात, त्यांनी सुनील जोशींना पॅरालिसिसचा अॅटॅक आल्याचे सांगितले. त्यातून ते बरे झाले. मला त्यांना भेटायला जायचे होते, पण कुठे रहातात हे माहिती नसल्याने एक दिवस योगेशजींबरोबरच त्यांच्या घरी गेलो. आता इथून पुढचं काळजीपूर्वक वाचा.

त्यांच्याकडे गेल्यावर आम्हाला दोघांनाही आनंद झाला. एखाद्या आजारातून बरं झालेल्या व्यक्तीला जसं आपण सहज विचारतो की काय झालं, कसं झालं, तसं मीपण विचारलं; तेव्हा त्यांनी जे सांगितलं ते असं—-

” मी सकाळी १० च्या सुमारास डिशमधे पोहे खात इथेच बसलो होतो. निम्म्याहून अधिक पोहे खाल्ले असतांना अचानक माझ्या हातातून डिश गळून पडली. पॅरालिसीसचा झटका आला होता. त्यामुळे एक बाजू गळाल्यासारखी झाली होती आणि तोंडही वाकडं व्हायला लागलं होतं. एरवी त्यावेळी घरात कोणीच नसतं, पण नशिबाने मुलाच्या क्लासला सुट्टी असल्याने तो घरी होता. तो लगेच धावत बाहेर आला. त्याला मी कसेबसे माझ्या त्या मित्राला घेऊन यायला सांगितले, ज्याच्याबरोबर नाष्टा झाल्यावर मी कंपनीत जायला निघतो. मुलगा खाली गेला तर तो मित्र रोजच्याप्रमाणे स्कूटरवरून आलाच होता. मुलाने त्याला सांगितल्याबरोबर तो मला घेऊन खाली आला आणि जवळच्याच डाॅक्टरांकडे घेऊन गेला. तिथे तपासणी होईपर्यंत २ वाजले होते. डाॅक्टरांनी ताबडतोब न्युराॅलाॅजिस्टकडे जायला सांगितले. त्याप्रमाणे त्यांनी सुचविलेल्या हाॅस्पिटलमधे आम्ही गेलो. तिथे लगेच तपासणी होऊन अॅडमिट केले आणि प्राथमिक उपचार सुरु केले. संध्याकाळी डाॅक्टर येऊन तपासून गेले आणि स्टाफला सूचना देऊन गेले. त्याप्रमाणे आैषधोपचार सुरू झाले. रात्री ८-८॥ च्या बेताला एक फिजिओथिअरपिस्ट भेट ध्यायला आली. मला तपासल्यावर हिला सांगितले की ‘ मी उद्या सकाळी लवकर आठ वाजता येते, तोपर्यंत यांना झोपू देऊ नका. यांच्याशी सतत बोलत रहा आणि जागं ठेवा.’ ती निघून गेल्यावर मला जे काय थोडंफार उच्चार करून बोलता येत होतं, तसं मी आणि ही, आम्ही दोघेजणं संस्कृतमधून गप्पा मारत होतो. (लक्षात घ्या हं, दोघं नवरा-बायको संस्कृतमधूनच एकमेकांशी बोलत होते.) आणि विशेष म्हणजे अधूनमधून मी रामरक्षा म्हणत होतो. अशा रितीने रात्रभर बर्‍याचवेळेस मी रामरक्षा म्हटली.

सकाळी ती फिजिओथिअरपिस्ट जशी आली आणि मला जसं बघितलं, तसे तिचे डोळे विस्फारले गेले. तिने हिला विचारलं की रात्रीतून तुम्ही काय केलं? हिने थोडसं घाबरत सांगितलं की ‘ काही नाही, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी ह्यांना रात्रभर जागं ठेवलं.’

त्यावर ती म्हणाली की ‘ नाही. तुम्ही नक्कीच काहितरी निराळं केलं असणार. कारण यांचं तोंड वाकडं झालेलं होतं, त्यासाठी मी माझ्याजवळच्या निरनिराळ्या आकाराच्या लाकडी गोळ्या गालात ठेवण्यासाठी आणल्या होत्या (तोंड सरळ होण्यासाठी फिजिओथिअरपिमधला हा एक भाग असतो), पण यांचं तोंड तर सरळ झालेलं दिसतंय. मला नक्की सांगा तुम्ही काय केलं?’

…….. तेव्हा हिने सांगितलं की ‘आम्ही रात्रभर संस्कृतमधून थोड्या गप्पा मारल्या आणि ह्यांनी बर्‍याच वेळेस “रामरक्षा” म्हटली.’

तिला आश्चर्य वाटल्याचं तिच्या चेहेर्‍यावर दिसत होतं. ती लगेच निघून जातांना म्हणाली की मग आता माझं काही कामच नाही. यासाठीच मी आले होते. (म्हणजे त्या रोग्याच्या तोंडाच्या आकारानुसार योग्य अशा आकाराची लाकडी गोळी जिकडे तोंड वाकडं झालं असेल त्याविरूद्ध गालात काही तास ठेवली जाते, जेणेकरून तोंड सरळ होण्यास मदत होते.)

फक्त रामरक्षा म्हटल्याचा आणि संस्कृत उच्चारांचा शरीरावर काय परिणाम होतो याचं हे माझ्यासमोरचं जिवंत उदाहरण मी पाहिलं. माझ्याशी ते अगदी व्यवस्थित बोलत होते.  

रामरक्षेच्या प्रभावाचा त्यांनी स्वतः घेतलेला अनुभव, जो त्यांनी स्वतः मला सांगितला, तो मनांत ठसला आहे.

लेखक : श्री.संतोष गोविन्द जोशी

माहिती संग्राहिका : सुश्री वीणा छापखाने 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माहेर… अनामिक ☆ प्रस्तुती – सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? मनमंजुषेतून ?

☆ माहेर… अनामिक  ☆ प्रस्तुती – सौ. उज्ज्वला केळकर ☆ 

आई बाप असतात तिथं माहेर असतंच असं नाही…. 

आणि जिथं माहेर असतं तिथं आई बाप असतातच असंही नाही….. 

माहेर ही खरं तर भावना असते….. जगून घेण्याची,  तर कधी अनुभूती असते काही क्षणांची…

तुम्हाला बरं नसल्यावर अर्ध्या रात्री मोबाईलच्या टॉर्चमध्ये नेमकी गोळी शोधून देणारा नवरा…

तुमचं लेकरू त्रास देतंय म्हटल्यावर हातातलं काम सोडून त्याला तुमच्याआधी पोटाशी घेणारी जाऊबाई…

तुम्ही झोपल्या असाल याचा अदमास घेत हळूच त्यांच्या कामाची वस्तू आवाज न करता, झोप न मोडता घेऊन जाणारे सासरे बुवा…

जास्त न बोलताही तुमच्यावर कायम मोठ्या भावाची सावली धरणारे भाऊजी……

सणाच्या दिवशीही नैवेद्याअगोदर तुम्हाला “आधी तू जेव” म्हणणाऱ्या सासूबाई…

एखाद्याच msg वरून तुम्ही नाराज असल्याचं नेमकं कळणारा मित्र…

” मी कायम आहे ” म्हणत सारं काही ऐकून घेणारी मैत्रीण.. 

आणि तुमच्या आजारपणात तुमचं बाळ हक्कानं घेऊन जाणाऱ्या, त्याला खेळवणाऱ्या, जेवण भरवणाऱ्या स्वैपाकाच्या काकू…

किंवा मग होळीला नवा कोरा ड्रेस बाळाला घालून त्याला घरी पाठवून देणाऱ्या शेजारीण काकू…

ह्या सगळ्या माणसांच्या सहवासात घालवलेल्या कित्येक क्षणांत माहेराचीच तर ऊब असते…

तीच शाश्वती …. तोच गोडवा… तोच विश्वास… ही माणसं आपल्याला एकटी पडू द्यायची नाहीत हे कायम स्वतःला सांगू शकणारे सुदैवी आपण !

आयुष्य खरंच सुंदर आहे……. फक्त हे असं माहेर जपता आलं पाहिजे !

लेखक : अनामिक 

संग्राहिका –  सौ. उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ आपलं माणूस…!!! ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ आपलं माणूस…!!! ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

नुकत्याच भिकेच्या डोहातून बाहेर काढलेल्या एका आजीचं आता कसं करावं ? काय करावं ? हा विचार डोक्यात सुरू होता… ! अशातच वाढदिवसानिमित्त गौरी धुमाळ या ताईंचा मला शुभेच्छा देण्यासाठी फोन आला. 

गौरीताई पौड भागात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत वृद्धाश्रम चालवतात. 

सहजच मी या आजीबद्दल गौरीताईंशी बोललो. त्या सहजपणे म्हणाल्या “ द्या माझ्याकडे पाठवून दादा त्यांना…! “

…. त्या जितक्या सहजपणे आणि दिलदारपणे हे वाक्य बोलल्या, तितक्या सहजपणे सध्या हा वृद्धाश्रम त्या चालवू शकत नाहीत याची मला पूर्ण कल्पना आहे. 

गौरीताई रस्त्यावर फिरत असतात…. निराधार आणि बेवारस पडलेल्या आजी-आजोबांना त्या रस्त्यावर आधी जेवू घालतात आणि त्यांना आपल्या आश्रमात कायमचा आसरा देतात. असे साधारण वीस ते बावीस आजी आजोबा सध्या त्या सांभाळत आहेत. 

एका फोटोमध्ये गरीब लोकांना भरपेट खाऊ घालताना त्या मला दिसल्या… मी त्याबद्दल त्यांचं कौतुक केलं…. यावर त्या डोळ्यात पाणी आणून म्हणाल्या, “ दोन-तीन वर्षांपूर्वीचा फोटो आहे तो …. या दोन-तीन वर्षांत माझे हे आजी आजोबा असे भरपेट जेवल्याचे मला आठवत नाही. रोजचं दोन वेळचं जेवण हीच आमच्यासाठी चैन आहे. अनेक बिलं थकली आहेत… कधी कधी वाटतं जग सोडून जावं… पण पुन्हा या आजी-आजोबांचा विचार येतो…. त्यांच्या चेहऱ्यावरचं करुण हास्य बघून दरवेळी मी माघारी फिरते….” —- हे बोलताना गौरी ताईंचा बांध फुटतो…! 

या ताईंना हा वृद्धाश्रम चालवण्यासाठी खरं तर कोणाचीच साथ नाही, सरकारी अनुदान नाही, जे काही थोडेफार डोनेशन मिळत आहे, त्यावर इतक्या लोकांचा संसार चालणं केवळ अशक्य आहे. 

आंबा खाऊन झाल्यावर त्याची कोय जितक्या सहजपणे रस्त्यावर फेकून देतात …. तितक्या सहजपणे आपल्या आई आणि बापाला रस्त्यावर सोडणारी मुले- मुली -सुना – नातवंड आम्ही रोज पाहतो…. 

दुसऱ्याच्या आईबापाला स्वतःच्या मायेच्या पदराखाली घेणारी ही ताई मला खरोखरी “माऊली” वाटते. 

परंतु आज हीच माऊली व्याकूळ झाली आहे…. परिस्थितीपुढे हरली नाही…. पण हतबल नक्कीच झाली आहे… ! 

अशा आई-वडील, आजी – आजोबा यांना आपला मदतीचा हात गौरीताईच्या माध्यमातून देता येईल. 

नळ दुरुस्त करणारा कितीही कुशल असला तरी डोळ्यातले अश्रू थांबवायला आपलं माणूसच असावं लागतं… 

गौरीताई यांच्या माध्यमातून आपणही या अंताला पोहोचलेल्या आजी-आजोबांचं ” आपलं माणूस ” होऊया का ? 

गौरीताई धुमाळ  यांच्याशी 74988 09495 या नंबरवर संपर्क साधता येईल…!

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ अर्ध्यावरचा डाव जोडला…. भाग – २ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ अर्ध्यावरचा डाव जोडला…. भाग – २ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

(भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी…. अर्ध्यावरचा डाव जोडला… अशी ही गोड कहाणी ! ) इथून पुढे 

यानंतर पुढच्या दोन दिवसात मला आणखी चार दिव्यांग तरुण भेटले….

यापैकी दोघांचे टेलरिंगचे व्यवसाय होते…. परंतु कोविड  काळात व्यवसाय थांबला… रोजच्या घरखर्चासाठी शिलाई मशीन सुद्धा मातीमोल किमतीने विकाव्या लागल्या…. दोन्ही कुटुंबे उघड्यावर पडली…! 

माणसाने नेहमी झऱ्यासारखं वहात रहावं…. कारण हे वाहणे थांबलं की याच झऱ्याचं डबकं तयार होतं…. झऱ्यावर नेहमी राजहंस येतात…. परंतु डबक्यावर मात्र येतात ते डास आणि घाणेरडे किडे…! …. यांच्याही आयुष्याचं वाहणं थांबलं…. मनामध्ये डबकं साठलं….पुढे अंधार दिसायला लागला…. आणि मग वाईट-साईट विचार या साचलेल्या डबक्यावर घोंघावायला लागले…!

या दोघांनाही शिलाई मशीन द्यायचं आम्ही ठरवलं…! 

श्री. जिगरकुमार शहा सर Upleap Social Welfare Foundation या सामाजिक संस्थेत सक्रिय – सन्माननीय सभासद आहेत.  या संस्थेमार्फत त्यांनी एक शिलाई मशीन आम्हास मिळवून दिले. …… “अर्ध्यावर फाटलेला डाव या मशीनवर शिवायचं आपण आता ठरवलं आहे …!”

उरलेले इतर दोघे…. एका चाळीत राहतात….घरासमोरच्या बोळातच काही न काही वस्तूंची विक्री करून आपलं कुटुंब चालवत होते…! कोविडच्या पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेने दोघांचीही घरं हळूहळू लुटून नेली…! 

“आमच्या वाईट काळात आमच्याच नातेवाइकांनी आमचे पाय खेचले…. आम्हाला गाळात घातलं “  यातला एक जण डोळ्यातून येणारे अश्रू, पालथ्या मुठीने पुसत म्हणाला होता…

“ दुसऱ्याचं घर लुटायला “पोती” घेऊन येतात ती कसली “नाती” मित्रा ? अशा नात्यांचा विचार करू नकोस इथून पुढे….आणि कायम लक्षात ठेव…. आपले पाय खाली खेचणारे लोक नेहमी आपल्या पायाशीच असतात….  असे लोक फक्त आपल्या पायाशीच घुटमळतात ; परंतु ते कधीही आपल्या हातापर्यंत पोहोचू शकत नाहीत….कारण त्यांची “उंची” तितकी नसते…हातात दम आहे तोवर कुणी पाय खेचले तर विचार करू नकोस…!”

या दोघांनाही विक्रीयोग्य सर्व साहित्य देऊन ” पुन्हा त्यांना पायावर उभं करण्याचं ” आपण ठरवलं आहे…!

…. “अर्ध्यावर मोडलेले संसार पुन्हा जोडण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत…!”

यानंतर माझे सहकारी श्री मंगेश वाघमारे आणि श्री अमोल शेरेकर यांना झटपट आवश्यक त्या सर्व सूचना देऊन …. आम्ही सर्वांनी आपापसात कामे वाटून घेतली…. करावयाची कामे आणि हातात असलेला वेळ यांची सांगड घालता; सर्व बाबी एकाच दिवशी, एकाच ठिकाणी १४ एप्रिलला करण्याचे आम्ही ठरवले. माझ्या दोन्ही सहकार्‍यांनी जीवतोड मेहनत घेऊन दोन दिवसात सर्व घडामोडी जुळवून आणल्या. 

१४ एप्रिल रोजी साईबाबा मंदिर, तोफखाना, शिवाजीनगर कोर्ट पुणे जवळ, या सर्वांना एकत्र बोलावलं…. आणि या सर्व गोष्टी श्री. जिगरकुमार शहा साहेब यांच्या हस्ते या सर्व दिव्यांग व्यक्तींना अर्पण केल्या…! 

श्री जिगरकुमार शहा साहेब आणि Upleap Social Welfare Foundation दोहोंचे आम्ही ऋणी आहोत…! 

कोणताही समारंभ नाही, कसलाही गाजावाजा नाही …. रस्त्यावर मी, डॉ मनीषा, श्री जिगर कुमार आणि आमची याचक मंडळी…. यांच्या सहवासात हा हृद्य सोहळा पार पडला…! … नाही म्हणायला दुपारचं कडकडीत ऊन पडलं होतं…. सूर्य आग ओतत होता….पण खरं “तेज” मला या पाचही जणांच्या चेहऱ्यावर झळकत असलेलं दिसत होतं….! जाताना त्यातला एक जण हात जोडत म्हणाला, “ मनापासून आभारी आहे सर…. आम्ही शून्य झालो होतो….तुम्ही आम्हाला जगण्याची…. उभं राहण्याची परत संधी दिलीत…”

त्याने बोललेल्या या वाक्यावर सहज मनात विचार आला… 

प्रत्येक जण शून्यच असतो… पण प्रत्येक शून्याला त्याची स्वतःची एक किंमत असते… या शून्याची किंमत जर आणखी वाढवायची असेल…. तर “कुणीतरी” त्या शून्याच्या शेजारी जाऊन फक्त उभं राहायचं असतं “एक” होऊन…! अशाने त्या शून्याची किंमत तर वाढतेच…. पण किंमत वाढते त्या शेजारी उभ्या राहणाऱ्या “कुणातरी एकची” सुद्धा !!!

या विचारात असतानाच फोन वाजला…. पलीकडून आवाज आला, “अहो सर येताय ना ? आम्ही वाट पाहत आहोत….” मी गोंधळलो…. “कुठे यायचं आहे मी ?“

“अहो सर, आज भारतरत्न श्री बाबासाहेब आंबेडकर सरांच्या नावे पुरस्कार देण्याचा कार्यक्रम आहे ना ? तिथे आम्ही आपली वाट पाहत आहोत, तुम्हाला आणि डॉ मनीषा दोघांनाही आज पुरस्कार आहे, विसरलात काय, मागे मी फोन केला होता …!”

— ओह…. मी या सर्व गडबडीत हे पूर्ण विसरून गेलो होतो…मी संयोजकांची मनापासून माफी मागून….

सकाळ पासून  घडलेल्या सर्व बाबी सांगितल्या…!

संयोजक मनापासून माफ करत म्हणाले…., “ आज खुद्द आदरणीय बाबासाहेब जरी इथे असते, तर ते म्हणाले असते…. ‘ इथे येवून पुरस्कार स्विकारण्यापेक्षा, तिथल्या गोरगरिबांच्या सुख-दुःखात समरस हो…. मला ते जास्त आवडेल….!’  आदरणीय बाबासाहेबांना जे आवडलं असतं…. असेच आज तुम्ही त्यांच्या जयंतीनिमित्त वागला आहात…. आम्ही तुम्हाला इथे एक पुरस्कार देणार होतो … पण तुम्ही तिथे राहून ५-५ पुरस्कार मिळवले…. अभिनंदन डॉक्टर…!!! “ हे ऐकून, माझ्या डोळ्यात पाणी तरळलं….! आदरणीय भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या…. या “महावीरांच्या” चरणांशी  मनोमन आम्ही नतमस्तक झालो…! 

यानंतर मग हसणारे पाच चेहरे मनात साठवत…. मी आणि डॉ मनीषा आम्ही गाणं गात निघालो ….

“अर्ध्यावरचा डाव जोडला…. अशी ही गोड कहाणी …!”

— समाप्त —

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ अर्ध्यावरचा डाव जोडला…. भाग – १ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ अर्ध्यावरचा डाव जोडला…. भाग – १ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

असाच एक सोमवार… पंधरा दिवसातल्या एका सोमवारी मी इथे येत असतो. इथं चौकात समोर जे मंदिर दिसतंय ना? बरोबर त्याच्या समोर एक दृष्टीहीन जोडपं रस्त्यात भीक मागत उभं असतं… या जोडप्याला लॉक डाऊन मध्ये आपण मास्क आणि सॅनिटायझर तथा तत्सम वस्तू विक्रीसाठी दिल्या होत्या. 

हे दोघेही लहानपणापासून शंभर टक्के अंध…. त्यातल्या त्यात एक गोष्ट बरी की, यांना जी दोन मुलं आहेत ती पूर्णतः व्यवस्थित आहेत…एक लहान मुलगा आणि एक तरुण मुलगी….आणि हे दोघे…. इतकाच चौकोनी संसार !

“ती” आणि “तो” एकमेकांना सांभाळून घेत आयुष्य जगत आहेत… “ती” कधी शक्ती होते तर “तो” कधी सहनशक्ती ! 

त्याच्या लहानपणी आई-वडिलांनी दगड मातीचं घर अर्थात एक निवारा उभारला होता…. इतक्या वर्षात हा निवारा हळूहळू पडत गेला….. एक दिवस तर असा आला की, हे दोघे आपल्या मुलांना घेऊन उघड्यावरच झोपायचे. या दोघांना आणि मुलांना पाहून आसपासच्या अनेक दयाळू लोकांनी यांना पुन्हा निवारा बांधून देण्याचा प्रयत्न केला… तरीही हा निवारा पूर्ण झालाच नाही…. एके दिवशी गोळ्या-औषधं घेता घेता बिचकत तो मला म्हणाला, “डॉक्टर साहेब थोडं काम राहिलंय घराचं… तुम्हाला काही मदत करता येईल का ? मला मदत करा हो….”  तो अत्यंत कळवळून बोलत होता. …. 

कळकळ, तळमळ आणि वेदना या नेहमी डोळ्यात दिसतात … याच्याकडे तर डोळेच नव्हते…

पण ही वेदना आणि तळमळ त्याच्या आक्रसलेल्या चेहऱ्यावरून ओघळून वाहत होती अश्रू सारखी… ! 

तसा हा नेहमी हसत मुख असतो…….. पण म्हणतात ना टेबल जर स्वच्छ आणि टापटीप दिसत असेल तर समजावं, त्याचा ड्रॉवर खचाखच भरला आहे नको असलेल्या गोष्टींनी …! यानेही सर्व वेदना नक्कीच मनातल्या ड्रॉवरमध्ये    लपवून ठेवल्या असतील…. 

मी पुढच्या ठिकाणी जाण्यासाठी गाडीवर बसलो….. समोर रस्त्याऐवजी त्याचा तो आक्रसलेला चेहरा आणि रात्री रस्त्यावर तरुण मुलगी, एक लहान मुलगा  आणि पत्नीसह असुरक्षित जागी राहणारा त्याचा संसार दिसत होता….!

त्याला खरी काळजी होती त्याच्या तरुण मुलीची….!!! 

या कुटुंबाचं नेमकं काय आणि कसं करावं? हा विचार करतच गाडी चालवत असताना एका ज्येष्ठ स्नेह्यांचा मला फोन आला. ते म्हणाले, “ अभिनंदन डॉक्टर, 14 एप्रिल रोजी आदरणीय भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या जयंती निमित्त आपणास ” भारतरत्न श्री बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार” जाहीर झाला आहे…नक्की या. “

“ होय होय…. धन्यवाद सर “ म्हणत मी फोन ठेवला. 

मनात पुन्हा विचार आला…. आदरणीय बाबासाहेबांना अपेक्षित असणारं गाव / राज्य / देश अजून तरी निर्माण झालंय का ? माझा त्यात हातभार कितीसा आहे ?  इतक्या मोठ्या माणसाच्या नावे पुरस्कार घेण्याची माझी खरंच पात्रता आहे का ? ……. हा विचार सुरू असताना उघड्यावर राहणाऱ्या त्या  कुटुंबातील व्यक्तींचे चेहरे पुन्हा माझ्यासमोर फेर धरून नाचू लागले…. काय करता येईल या विचाराने मी अस्वस्थ झालो…! 

या अस्वस्थतेत पुन्हा फोन वाजला…. मी अनिच्छेने फोन उचलला…. पलीकडे माझे मित्र श्री जिगरकुमार शहा होते. सच्चा दिलदार माणूस ! 

“ काम कसे सुरू आहे ? काय चाललंय ? माझ्याकडून काही मदत हवी आहे का ? “ अशा प्रकारची चर्चा सुरू असताना, फोन ठेवते वेळी ते मला म्हणाले, “ डॉक्टर तुम्हाला तर मदत करतोच आहे…. पण त्यासोबत तुम्हाला जर कोणी अत्यंत अडचणीत असलेली, मदतीची नितांत आवश्यकता असलेली कुणी अंध / अपंग व्यक्ती सापडली, तर मला नक्की कळवा…..  या वर्षात मला अशा एखाद्या व्यक्तीला डायरेक्ट मदत करायची आहे…! “

….. माझा माझ्या कानांवर विश्वास बसेना…. मला वाटलं गाडी चालवत असताना, गोंगाटामुळे मला चुकीचं काहीतरी ऐकू आलं असावं…..जवळपास किंचाळत मी त्यांना पुन्हा विचारलं, “ सर गाडीवर आहे, नीट आवाज आला नाही,  आवाज ब्रेक होतोय…. पुन्हा एकदा बोला शेवटची वाक्ये प्लीज …! “…. मी ऐकलं ते खरं होतं…. त्यांना तेच म्हणायचं होतं ! 

मी गाडी बाजूला घेऊन थांबलो….नुकत्याच भेटलेल्या दृष्टिहीन दाम्पत्याची कर्मकहाणी मी त्यांना सांगितली…. त्यांना डायरेक्ट मदत करण्याविषयी विनंती केली…. अगदी सहजपणे ते म्हणाले…., “ Okk Doc, I don’t have any problem…. तुम्ही सांगताय म्हणजे ती व्यक्ती आणि कुटुंब Genuine असणार याची मला खात्री आहे. आजपासून या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी माझी.”

जिगरकुमार शहा साहेब नुसतं एवढं बोलून थांबले नाहीत…. तर त्यांनी या दृष्टिहीन दाम्पत्याच्या घराच्या खर्चासह, त्यांच्या मुलामुलीच्या शिक्षणाची आणि त्यांच्या इतर सर्वांगीण विकासाची जबाबदारी स्वतःच्या डोक्यावर घेतली आहे… !… हे सर्व करायला नुसता पैसा असून चालत नाही…. मनामध्ये दुसऱ्यासाठी काहीतरी करायची “जिगर” असावी लागते…! 

आपल्याला लागतं आणि आपल्या डोळ्यातून पाणी येतं तेव्हा होते ती “वेदना”…. परंतु जेव्हा दुसऱ्याला लागतं आणि आपल्या डोळ्यातून पाणी येतं तेव्हा जी होते ती “संवेदना”…!

….. अशा या संवेदनशील माणसाला मी मनातूनच साष्टांग नमस्कार घातला…. ! हरखून त्यांना म्हटलं, “ सर कधी करूया हे सर्व ? “

ते म्हणाले, “ १४ एप्रिलला मला सुट्टी आहे त्या दिवशी सर्व आटोपून टाकू…चलेगा ??? “ 

“ दौडेगा सर…” म्हणत मी गाडी मागे वळवली आणि त्या कुटुंबाला ही बातमी सांगायला परत निघालो…. 

यानंतर “तिच्या” आणि “त्याच्या” चेहऱ्यावर पसरलेल्या आनंदाचे चित्र रेखाटण्यास, माझी लेखणी असमर्थ आहे… ! 

उन्हानं…. घामानं आपला जीव कासावीस व्हावा …. घशाला कोरड पडावी…. आणि तेवढ्यात समोर आंब्याचं झाड दिसावं…. या झाडाच्या थंडगार सावलीत आपण टेकावं आणि इतक्यात कुणीतरी येऊन वाळा घातलेल्या माठातल्या थंडगार पाण्याने भरलेला तांब्या आपल्यासमोर धरावा…. घट घट करून, पाणी पीत आपण आपला जीव शमवावा आणि उरलेलं पाणी ओंजळीत घेऊन, चेहऱ्यावर त्याचे शिपकारे मारावेत…. यासारखी तृप्तता नाही…. ! 

…… “त्या “दोघांचे समाधानाने भरलेले चेहरे आणि जिगर साहेबांचा दिलदारपणा याने हीच तृप्तता मला लाभली… ! 

भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी…. अर्ध्यावरचा डाव जोडला… अशी ही गोड कहाणी ! 

—–क्रमशः भाग पहिला… 

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ स्वप्न… ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? मनमंजुषेतून ?

☆ स्वप्न… ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

“स्वप्नं” किती तरल, हळूवार, अलगद, नाजूक शब्द पण व्याप्ती किती मोठी. स्वप्ने जरूर बघावीत पण स्वप्नरंजन नको. स्वप्नांच्या मागे जरूर लागावे पण तेच अंतिम सुख आहे असे वाटणे नको. कधीकधी स्वप्नांमुळे उत्तुंग यशाचे शिखर गाठता येते, तर कधी ह्याच स्वप्नांच्या ध्यासामुळे आपण निराशेच्या गर्तेतही ढकलल्या जातो. स्वप्नांपेक्षाही वास्तवतेची कास धरा, सकारात्मक व्हा. जास्त अनुभव मिळतो .

मला स्वतःला जी लोकं उत्तुंग, आकाशाला गवसणी घालणारी स्वप्ने बघतात त्यांच्याबद्दल प्रचंड कौतुक, आदर वाटतो. पण मला स्वतःला स्वतःच्या बाबतीत म्हणाल तर लहान लहान स्वप्नं बघण्यात जास्त आनंद मिळतो.एकतर लहान स्वप्ने आवाक्यातील असतील तर लौकर पूर्ण होतात आणि अल्प गोष्टीतही समाधान, सुख,आनंद शोधण्याची सवयच लागून जाते कायमची. 

बरेचदा स्वप्ने बघतांना आपण पराकोटीची मेहनत करतो,ही चांगलीच गोष्ट आहे.परंतु ह्याचा दुष्परिणाम जर आपल्या प्रकृतीवर होत असेल तर तीच स्वप्नं आपल्याला महागात पण खूप पडतात. माझ्या मते स्वप्नं ही जिन्याच्या पाय-यांसारखी असतात. त्या एकेका पायरीवर क्षणभर विसावा घेऊन दुसरी पायरी चढावी, म्हणजेच दुसऱ्या स्वप्नाकडे वळावं. एका दमात पूर्ण जिना चढून जाण्याच्या प्रयत्नात ,सगळी स्वप्ने झटक्यात कवेत घ्यायच्या प्रयत्नात, शेवटच्या पायरीपर्यंत पोहोचेस्तोवर आपला जोर, दम संपुष्टात येऊन त्याचा स्वाद घ्यायला ना आपल्यात जोर शिल्लक राहतो ना उत्साह. मोठ्या स्वप्नाच्या मागे लागतांना कदाचित आपण लहान लहान आनंदाला पण मुकून जातो.

स्वप्नांचे इमले चढवितांना ध्यास असावा पण हव्यास नको. स्वप्नांची पूर्तता करतांना माणसे तोडण्यापेक्षा जोडण्यालाच नेहमी प्राधान्य द्यावं. स्वप्ने पूर्ण व्हावीत ही इच्छा जरूर असावी पण अट्टाहास नको. शेवटी काय हो सगळ्या मानण्याच्याच गोष्टी. तुकडोजी महाराज म्हणतातच नं ,” राजास जी महाली, सौख्ये कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली, ह्या झोपडीत माझ्या.” जशीजशी समज येते,आणि प्रगतीची कास धरावी वाटू लागते तशीतशी माणसाला स्वप्ने बघायची सवय लागत असावी असं वाटतं. अर्थात माणसाला स्वतःची उन्नती करावयाची असेल तर नुसतं स्वप्नं बघून पण भागणार नाही. ती स्वप्नं पूर्णत्वास कशी जातील ह्याचा पण विचार करायला हवा.साधारणतः किशोरावस्था ते अख्खं तरुणपण हा काळ स्वप्नरंजनासाठीच असतो जणू. मग नंतर कुठे वास्तविकतेचं भान येऊन आणि अनुभवाचे टक्केटोणपे खाऊन सत्य परिस्थिती सामोरी आल्यावर खरं भान येते.

स्वप्न हा विषय काल एका गमतीनं सुचला. स्वप्नं बघणं आणि स्वप्नं दिसणं ह्या दोन भिन्न बाबी आहेत. झोपेत ब-याचश्या व्यक्तींना स्वप्नं दिसतात. साधारण आपण दिवसभरात ज्या गोष्टी बघतो, अनुभवतो त्याच्याशी निगडित स्वप्नं पडतात.  परवा एकदा टिव्हीवर बातम्या बघत असतांना एका बड्या व्यक्तीच्या घरं व प्रतिष्ठानांवर “ईडी”ची पडलेली धाड दाखवत होते.आजकाल नवीनच फँड आलंय. एकच बातमी आणि त्याच्याशी निगडीत फुटेज हे मेंदूवर हँमरींग केल्यासारखं वारंवार कित्येकदा दाखवलं जातं. दिवसभर ती ईडीची धाड बघितली. त्या को-या करकरीत नोटांच्या थप्प्यावर थप्प्या आणि सोने,चांदी, हिरे मोती,प्लँटीनम ह्यांचे घरातून निघालेले दागिने बघून मी बँकर असूनही मला चक्कर आल्यागत वाटलं. त्यानंतर होणारी ती झाडाझडती, ते आरोप, ते आपल्याच घरात चोरासारखं बसणं बघून वाटलं आपल्याकडे गरजेपुरतीच संपत्ती आहे हेच छान.

दिवसभर तेच बघितल्यामुळे असेल वा डोक्यात तेच बसल्यामुळे असेल मलाही रात्री माझ्या घरी धाड पडल्याचं स्वप्नात दिसलं. घरी दागिने, नोटांच्या थप्प्या काहीच नसल्याने मी स्वप्नातही नेहमीसारखीच निर्धास्त होते. पण स्वप्न आत्ता कुठे सुरू झालं होतं,आणि मस्त नाँनस्टाँप झोपेची सवय असल्यानं स्वप्नंही सुरुच राहणार होतं. त्या धाड टाकणा-या अधिका-यांनी सर्वप्रथम वाँर्डरोब कुठे आहे विचारले. दागिने, नोटांच्या थप्प्या नव्हत्याचं त्यामुळे त्या सापडण्याचा प्रश्नच नव्हता. त्या अधिका-याने सांगितले की ही ईडीने “साडी”  ला संपत्ती समजून टाकलेली  ” धाड” आहे. आता मात्र माझं धाबं दणाणलं. 

वाँर्डरोब उघडल्याबरोबर माझी ईस्टेट म्हणजे माझ्या साड्यांची गिनती चालू केली. त्या साड्यांच्या थप्प्या ते भराभर उलगडून मोजू लागले. तरी नशीब मला सरसकट बायकांना त्या साड्यांच्या घडीत नोटा ठेवायची सवय असते ती सवय अजिबात नव्हती. नाहीतर अजूनच आफत होती.

त्या एकएक साडीबरोबर त्यांच्या घड्यांसारख्या त्याच्याशी निगडीत एकेक आठवणींचे पदर उलगडायला लागलेत. साड्या हा बायकांचा विकपाँईंट. आईनं, बहीणीनं, वन्संनी आणि सगळ्या जवळच्या लोकांनी दिलेल्या साड्या मी त्यांना खुलासा म्हणून एक एक प्रसंग ,साडी देण्याचं निमीत्त असलेलं सबळ कारण सांगू लागले. मी सांगतांना थकतं नव्हते पण ते अधिकारी मात्र ऐकतांना घामाघूम होत होते. ते म्हणाले हे बायकांचे एकमेकींना साड्या गिफ्ट द्यायचे फंडे आम्हा माणसांच्या लक्षातच येत नाही. 

त्या अधिक-यांनी घामाघूम होत माझ्या साड्यांचे गठ्ठे मारले आणि एवढ्यात त्यांच्या कार्यालयात फँक्स आला म्हणे. साड्या हे अतिशय कष्टानं जमवलेलं, जीवापाड जपलेलं स्त्रीधन असल्याने त्यावर कुणीच कायद्यानं जप्ती आणूच शकत नाही. तेव्हा परत मनातल्या मनात स्वतःच्या नशीबाला दोष देत त्या अधिका-यांनी माझा जसा होता तसा साड्यांच्या व्यवस्थित घड्यांनी माझा वाँर्डरोब परत नीट लावून दिला.

तेवढ्यात फटफटल्यासारखं वाटलं आणि खडबडून जाग आली. सरावाने उठल्याबरोबर हात मोबाईलकडे वळला आणि बघते तो काय– वन्संनी माझ्यासाठी घेऊन ठेवलेले चार पाच साड्यांचे फोटो व्हाट्सएपवर माझ्याकडे बघून हसत होते. आणि मी सुद्धा परत एकदा वाँर्डरोब उघडून माझी संपत्ती डोळे भरून बघितली आणि रात्री पडलेलं हे एक दुःस्वप्नं होतं हे जाणून कामाला लागले.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares