मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ आई कल्पतरू… ☆ सौ. कल्पना मंगेश कुंभार ☆

सौ. कल्पना मंगेश कुंभार

? कवितेचा उत्सव ?

☆ आई कल्पतरू… ☆ सौ. कल्पना मंगेश कुंभार ☆

आई– नुसता शब्द जरी उच्चारला तरी रोम रोम शहारते..उत्साहाची एक वेगळीच लहर संपूर्ण शरीरात तयार होते..निर्मात्याने जेव्हा ही जीवसृष्टी निर्माण केली तेव्हा प्रत्येक जीवाची काळजी घेणं त्याला शक्य नव्हतं, म्हणूनच की काय…त्याने प्रत्येक प्राणीमात्रासाठी आई निर्माण केली..जी  नवीन जीवाला फक्त जन्म देत नाही तर स्वतः च्या जीवाची पर्वा न करता त्याचे रक्षण करते..पालन करते..त्याला सुसंस्कारित करते..

मागे एकदा माझी लेक डिस्कव्हरी चॅनल पहात होती..सिंह शिकार करत होता अन् जिराफ आपल्या पिल्लाचं रक्षण करण्यासाठी त्या सिंहाचा प्रतिकार करत होते..ते पाहून लेक  मला म्हणाली, ” जिराफाला समजत नसेल का? सिंहापुढे आपलं काय चालणार नाही..निदान स्वतः चा तर जीव वाचवायचा..” मी फक्त एव्हढंच म्हणाले,” बाळा, आता ती फक्त आई आहे..जिला आपल्या पिल्लाला वाचवायचं आहे..” 

आई..मग ती कोणाचीही असो..जेव्हा तिच्या बाळावर एखादं संकट येतं तेव्हा ती सर्व शक्ती एकवटून प्रतिकार करते..फक्त आपल्या बाळासाठी..आई..ही शेवटच्या श्वासापर्यंत  आईच रहाते..पिल्लू मात्र आपल्या भूमिका बदलत जाते..माझी आईही अगदी अशीच आणि मीही भाग्यवान आहे आज मीही एक आई आहे..”आई म्हणायचीच, जेव्हा तू आई होशील ना तेव्हा समजेल आई काय असते “. खरंच …आईपण मिळणं हे भाग्यच..

माझ्या प्रत्येक कणावर—आयुष्यातील प्रत्येक क्षणावर— जिच्या संस्काराचा पगडा .. ती माझी आई..माझी सगळ्यात जवळची मैत्रीण..जिच्यामुळे मी आज माणूस  म्हणून आपल्या मातीशी एकरूप झाले आहे..ती माझी आई…विजया.

नावाप्रमाणेच आयुष्यातील प्रत्येक संकटाशी झगडत..त्या त्या क्षणी न डगमगता प्रत्येक संकटावर ती मात करत गेली अन् माणूस म्हणून आम्हाला घडवत गेली. मला अन् दादाला वाढवताना रोज कळतनकळत कधी गोष्टीतून तर कधी स्वतः च्या कामातून..कधी घडणाऱ्या घटनांचे विश्लेषण करून..कधी इतिहासातून…  तिने आमच्यावर जे संस्कार केले..त्यामुळेच आज मी व माझा दादा जीवनाचा आनंद घेत आयुष्य कसे जगायचे? ..माणसं कशी जोडायची?..पैशापेक्षा माणूस का महत्वाचा?..हे शिकलो..आज माझा दादा उत्तम डॉक्टर आहे..मी प्राथमिक शिक्षिका आहे केवळ आईवडिलांच्यामुळे..

आजही जेव्हा वयाच्या ६६व्या वर्षीही तिच्यातील उत्साह..चैतन्य पाहिलं की वाटतं..कुठून येते तिच्यात ही एनर्जी ?? आणि खळखळून हसणाऱ्या तिला पाहिलं की वाटतं..तिच्यातील आत्मविश्वास..सकारात्मकता .. जगाकडे पाहण्याचा दृष्टीकोन..यामुळेच ती वेगळी आहे… अगदी वेगळी .. आयुष्यात इतकी संकटे आली..कित्येक वेळा अगदी एकटी पडली, पण तिच्यातला आत्मविश्वास व सकारात्मकता यामुळेच ती प्रत्येक संकटावर मात करू शकली ..फक्त तिचा चेहरा पाहिला तरी आजही मन प्रफुल्लित होतं..सगळी नकारात्मक भावना दूर पळते अन् मन तिच्या हास्यात आजही गुंतून जातं..आजही आठवतं भाकरी थापताना तिचं अभंग किंवा श्लोक म्हणणं.. स्वयंपाक करताकरता नकळत त्या  रुचकर जेवणात अमृत पेरणं  ..नवीन काही शिकवून जाणं..

माझी आई माध्यमिक शिक्षिका..गणित विषयात तिचा हातखंडा..पण लग्नानंतर शिक्षण घेताना एम .ए .ला इतिहास विषय ठेवल्यामुळे साहजिकच इतिहास विषय शिकवावा लागला..पण तरीही जे असेल ते अतिशय अभ्यासपूर्ण व मनापासून करणं हे तिचं तत्व, जे तिनं निवृत्त होईपर्यंत निभावलं..आज अभिमान वाटतो तिचा जेव्हा तिचे विद्यार्थी अगदी चाळीस /पन्नास वय असलेले, रस्त्यात वाकून नमस्कार करतात..तिची चौकशी करतात..आयुष्यात आणि दुसरं काय हवं..

आज मलाही या लेखातून  तिला सांगायचं आहे ..आज मी जी काही आहे ती फक्त तिच्यामुळेच …तिने दिलेल्या प्रत्येक क्षणासाठी मी कृतज्ञ आहे……. 

आई म्हणजे चैतन्याने सजलेलं अंगण..

आई म्हणजे देवापुढे शांत तेवणारं निरांजन..

आई असतो घराचा श्वास..

तिच्यामुळेच सगळीकडे देवत्वाचा भास..

लेकरासाठी हळवी,मायाळू, प्रसंगी चंडिकाही बनते ती..

घराला सावरताना कित्येक वार झेलते ती..

चुका पोटात घालून पडता पडता सावरते..

बाळासाठी कितीदा तरी दुःखाचे कढ आवरते..

आई …… आत्मारुपी ईश्वर..

तो ज्याला लाभला….. त्याचे जीवन अमृतमय निरंतर…… 

© सौ. कल्पना मंगेश कुंभार

शाळा : हुतात्मा बाबू गेनू विद्यामंदिर क्र 28, इचलकरंजी

मोबाईल : 9822038378

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ अनमोल भाग्य…लेखक – श्री मिलिंद जोशी ☆ प्रस्तुती – श्री माधव केळकर ☆

? मनमंजुषेतून ?

 ☆ अनमोल भाग्य…लेखक – श्री मिलिंद जोशी ☆ प्रस्तुती – श्री माधव केळकर ☆ 

माझ्या वडिलांचे वय आता ८० च्या जवळपास आहे. त्यांना पार्किन्सनचा आजार आहे. त्यामुळे त्यांचे बोलणेही तोंडातल्या तोंडात येते. चालताना ही वॉकर लागतो. अनेकदा वळताना त्यांचा तोल जातो. कधी कधी ते वॉकर विसरून जातात आणि हळूहळू भिंतीच्या आधाराने चालतात. तोल गेला की पडतात. थोडेफार लागते. मग पुढील दोन तीन तास त्यांना धीर द्यावा लागतो. या गोष्टी खूप सामान्य आहेत हे त्यांच्या मनावर ठसवावे लागते. मनातील भीती कमी झाली की परत पूर्ववत होतात. पण यामुळे आम्हाला कायम त्यांच्यावर लक्ष ठेवावे लागते. बरे आपल्याला कायम घरात राहणे शक्य नसते. त्यामुळे कधी कधी नाईलाजास्तव त्यांना घरात ठेवून बाहेरून कुलूप लावून दीड दोन तासांसाठी बाहेर जावे लागते. त्यावेळी त्यांना सगळे जवळ द्यायचे आणि आपण आपल्या कामाला जाऊन यायचे. 

काका ( मी वडिलांना ‘काका’ म्हणतो ) दुपारी टीव्ही लावतात आणि बसल्या बसल्या झोपून घेतात. त्यामुळे त्यांना रात्री लवकर झोप येत नाही. मग त्यावेळी आपण काम करताना एकीकडे जुने गाणे लावले की ते खुश. कधी कधी त्यांचे जुने किस्से सांगत बसतात. अनेकदा तर त्यांचे बोलणे आपल्याला समजत नाही. मग आपण फक्त होकार द्यायचा. आपल्या चेहऱ्यावरून त्यांना लगेच समजते, आपल्याला त्यांचे बोलणे काहीच कळलेले नाही. मग त्यांच्या चेहऱ्यावर हसू येते.

त्यांचा एक गुण मात्र घेण्यासारखा आहे. अजूनही ते त्यांना ज्या ज्या गोष्टी शक्य होतील ते सगळे काम करतात. रात्रीचे जेवण झाल्यावर ओट्यावर जितके कप असतील ते विसळून ठेवतात. काही निवडायचे असेल तर निवडत बसतात. ओटा आवरून घेतात. आम्ही त्यांना कितीही सांगितले तरी त्यांना त्याशिवाय होत नाही. आम्हीही मग ‘जे करायचे ते करा’ म्हणून मोकळे होतो. कारण ज्यावेळी ते काही काम करतात त्यावेळी खुश असतात. काहींना पटणार नाही पण अनेकदा घरातील वयस्कर व्यक्तींना आपण काम करू दिले नाही तर ते जास्त चिडचिड करतात असा माझा अनुभव आहे. कारण अनेकदा त्यांना असे वाटते की, त्यांचे घरातले महत्व कमी झाल्यामुळेच आपण त्यांना काम करू देत नाही. 

मध्यंतरी काकांना acidity चा त्रास होत होता. डॉक्टरांनी त्यासाठी गोळ्या दिल्या. इतक्या गोळ्या कशा घ्यायच्या म्हणून त्यांनी दोन दिवस पार्किन्सनच्या गोळ्या घेतल्या नाहीत. परिणाम असा झाला की त्यांना वेगवेगळे भास होऊ लागले. त्यांना कुणी बसलेले दिसायचे. किंवा खालून कुणी खिडकीवर दगड मारताहेत असे वाटायचे. ते दोन दिवस आम्ही जाम घाबरलो होतो. एक दिवस वैतागून मी त्यांना काहीतरी चिडून बोललो. मग काय… फुल झापून काढला त्यांनी मला. संध्याकाळी तायडीचा व्हिडिओ कॉल आला. त्यांनी लगेच तिलाही सांगितले, ‘मिलिंद आज माझ्यावर चिडला होता.’ मग काय विचारता, तायडीनेही हसत हसत मला कानपिचक्या दिल्या आणि काका खुश. 

एक मात्र अगदी खरे आहे, त्यांच्यासाठी जरी आम्हाला कुणाला तरी कायम घरात राहावे लागते, तरीही ते कधीच आम्हाला ‘जबाबदारी’ वाटत नाहीत. उलट आम्हाला त्यांचा “आधार”च वाटतो. याचे सगळे श्रेय फक्त आणि फक्त काकांनाच आहे. कारण त्यांनी त्यांचे आजारपण आणि त्यानंतरचे त्रास स्वीकारले आहेत. एकदा का माणसाने समोर येणाऱ्या घटनांचा स्वीकार केला की त्याला फारसा मानसिक त्रास होत नाही. ना त्यांची आमच्या बद्दल काही तक्रार आहे, ना जीवनाबद्दल. अनेकदा आम्ही एकमेकांची चेष्टा मस्करी करतो त्यावेळी शेजारच्यांना वाटते, माझे वडील भाग्यवान आहेत. पण मला वाटते, आम्ही मुलं जास्त भाग्यवान आहोत की आम्हाला असे आईवडील मिळाले, जे प्रत्येक गोष्ट समजून घेतात. जो पर्यंत आई होती, तिने कायम आम्हाला वागणुकीचे धडे दिले. आणि वडील अजूनही त्यांच्या वागण्यातून ‘सकारात्मक जीवन कसे जगावे’ याचे धडे देत आहेत. मला वाटते, भलेही आपल्याकडे पुरेशा सुविधा नसल्या तरी आपल्याला समजून घेणारे पालक आपल्या सोबत असतील तर त्यासारखे दुसरे भाग्य नाही.  

लेखिका : श्री मिलिंद जोशी, नाशिक

प्रस्तुती – श्री माधव केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ बाप्पा आणि तो… ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे ☆

श्री उदय गोपीनाथ पोवळे

??

बाप्पा आणि तो… ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे☆

बाप्पा आलास काय आणि गेलास ही. अगदी आमच्या मुलासारखाच.  तो पण पूर्वी असाच यायचा. शिकायला म्हणून अमेरिकेला गेला आणि तो कायमचा तिकडचा झाला. सुरुवातीला, आला की जरा स्थिरस्थावर होतो ना होतो, तोच  आठ दहा दिवसांत परत जायचा. अगदी तुझ्यासारखाच. आता तू तरी दरवर्षी नित्यनियमाने ठरलेल्या वेळेस न विसरता येतोस. पण त्याचे  तसे नाही. गेले कित्येक वर्षे तो येतो सांगून आला नाही. दरवर्षी तुझ्यासारखीच त्याचीही वाट बघतो पण काही खरं नसतं. येण्याच्या एक दिवस आधी त्याचा फोन येतो. कामानिमित्त त्याला घरी यायला जमणार नाही असे तो सांगतो तेव्हा हिच्या डोळ्याच्या कडा ओल्या होतात आणि नेमक्या त्या माझ्या भुरकटलेल्या डोळ्यांना दिसतात. पण तुझे मात्र तसे नसते. तू येतोस वेळेवर आणि जातोस ही वेळेवर. चटका लावून जातोस पण ठीक आहे. मनाला पुढच्या एक वर्षासाठी उभारी देऊन जातोस. मला आणि हिला जगण्याची एक नवीन उमेद देतोस आणि आशेची नवीन पालवी मनात उभी करतोस. आज ना उद्या तो घरी येईलच ह्याची मनात आशा निर्माण करतोस.

— बाप्पा खरं सांगू, आता आमचीच खात्री नाही रे. अरे आमचेच विसर्जन होते की काय असे वाटू लागले आहे. आता तूच सांग, आमच्या दोघांतील एकाचे विसर्जन झाल्यावर तू किंवा तो आलास तरी आत्तासारखे तुमचे लाड होणार आहेत का ? अरे पुढच्या वेळेला तुम्ही आलात आणि आमच्या दोघांतील एकाचे कायमचे विसर्जन झाले असेल तर तुम्ही आलात काय आणि परत गेलात काय, आम्हाला त्याचे अप्रूप राहील का ? म्हणूनच बाप्पा एक काम कर. तूच त्याचे कान उपट आणि त्याला बुद्धी देऊन आम्हाला भेटायला पाठव. अरे त्याला जरा समज दे आणि सांग, तो लहान असतांना त्याच्या हट्टापायीच आम्ही तुला घरी विराजमान केला होता ना. त्याच्यासाठी म्हणून तुझे सगळे लाड आम्ही पुरवत होतो ना. अरे आता आम्हाला वयानुसार तुझे साग्रसंगीत लाड करायला जमत नाही. पण तो  येईल आणि आल्यावर त्याला सगळे पहिल्यासारखे दिसायला पाहिजे म्हणून आम्ही ते सगळे करतोय. पण आता थकलोय रे आम्ही.

बाप्पा, एक मात्र चांगले आहे. जशी तू पुढच्या वर्षी येण्याची आशा लाऊन जातोस, तसा तो लांब असला तरी कधीतरी येईल ह्याची आशा लागून रहाते. ह्याबाबतीत तरी आमचे नशीब थोर की तो आहे म्हणून, तो कधीतरी परत येईल ह्याची खात्री वाटते.  बाप्पा तो, तुझ्या काय किंवा आमच्या दोघांच्या विसर्जनाला जरी आला नाही तरी त्याला मात्र तू उदंड आयुष्य दे आणि त्याला त्याच्या उतारवयात पोरका मात्र करू नकोस.

गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी नक्की या.

© श्री उदय गोपीनाथ पोवळे

ठाणे

मोबा. ९८९२९५७००५ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ शिक्षक दिन मुबारक… सुश्री संध्या शिंदे ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

? मनमंजुषेतून ?

☆ शिक्षक दिन मुबारक… सुश्री संध्या शिंदे ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆ 

वर्गातल्या सगळ्यांना भागाकार करता आला त्या दिवशी कित्येक कोटींची लॉटरी लागल्यागत सुखाची झोप लागणारा प्राणी आहे मी !

“मज्या आईनं विष पेलं रात्री. पण तुम्ही आज मॉनिटर निवडणार,म्हणून आलो शाळेत.मला मॉनिटर व्हयचंय मॅडम!” म्हणत काळीज चिरणारा, केस कापण्यासाठी पैसे नाहीत म्हणून हातानेच वेडीवाकडी कटिंग करणारा—- यश …

मी वर्गात चिडचिड केल्यावर जवळ येऊन हळूच “मिष्टर ला भांडून आलात का मॅडम?” म्हणणारी — तेजू…

शाळेच्या मागच्या गेटच्या पायर्‍यांवर बसलेल्या लहान बहिणीच्या जबाबदारी पोटी “बाथरूमला जायचंय” असं मला वारंवार खोटं बोलून वर्गाबाहेर, तिच्याकडे जाण्यासाठी माझा ओरडा खाणारा — माऊली….

केवळ माझ्या गाडीवर फेरफटका मारण्याची लहर आली म्हणून “मला घरी नेऊन सोडा.” असा हट्ट करणारी,आईचा नंबर माहीत असूनही तो न देता मला गावभर उन्हातान्हात फिरवणारी बालवाडीतली  

टुचभर  — सिद्धी….

पडलेला दात कंपासमध्ये जपून ठेवणारी, डोळ्यातलं बुबुळ कुत्र्याने दातांनी ओरबाडल्यावरही आईजवळ  हट्ट करून, तिच्यासोबत शाळेत येऊन चाचपडत मला मिठी मारणारी—- वीरा…..

निसर्गाने आधीच दिलेले टप्पोरे डोळे अजूनच मोठे करून, दोन्ही कमरेवर हात ठेवून ” मी बुटकी आहे, म्हणून तुम्ही मला असं करतात ना?” असा चिमण्या आवाजात बिनाबुडाचे आरोप करणारी, मला पामराला सतत कचाकचा भांडणारी – थाक्ची….

“मला घरी आई नाही, पण शाळेत माझ्या मॅडम माझी आई आहेत.” असं शेवटच्या पानावरच्या निबंधात लिहिणारी  — आकांक्षा….

बहिणीच्या लग्नासाठी आठ दिवसांची सुट्टी मिळवण्यासाठी मला साडीचं आमिष दाखवणारा — अर्णव…

मनाविरुद्ध, परिस्थितीसमोर हतबल होऊन आईसोबत ऊसतोडीला गेलेलं व सर्पदंशामुळे मातीआड झालेलं हसरं दुःख.. — सौरभ….

आपल्या बाळाला कडेवर घेऊन धावत धावत येऊन माझ्या वर्गात  शिरलेली , ” माझं नाव या हजेरीत लिहा! “असं पोटतिडकीने म्हणणारी उध्वस्त— संगीता….

माझ्या साडीच्या निऱ्या धरून वर्गाबाहेर फरफटत आणून ” मेरकु चाय पीने का जी…. घरकु जान दो…नै तो तुम पिलाव चाय…तुमको दुवा लगेगी जी! ”  असं जोरजोरात ओरडणारी  डेंजर — अलिजा….

खोडरबरमुळे वहीवर होणारा कचरा साफ करण्यासाठी अब्बूचा दाढीचा ब्रश शाळेत घेऊन येणारी— जोया…

पर्समध्ये झुरळ बघितल्यावर मी किंचाळत टेबलवर चढल्यावर माझी उडालेली तारांबळ, फजिती माझ्याच मोबाईलच्या कॅमेऱ्यात टिपणारा मॉनिटर—- नयन….

एचआयव्ही पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्याक्षणी डेस्क लागून रक्तबंबाळ झालेला, मला अस्वस्थ अस्वस्थ करून सोडणारा  — विश्वजीत….

काय काय अन् किती सांगू..?  मर्यादा आहेत…

एकोणविसावं वर्ष सुरू आहे…

एकोणवीस बॅचेस…

असंख्य चालत्या फिरत्या जिवंत कादंबऱ्या वाचल्यात मी यादरम्यान……… 

या 19 वर्षांत एकही दिवस, एकही क्षण ह्या लेकरांनी माझ्यातल्या शिक्षकाला मरू दिलं नाही… मरु काय, झोपू दिलं नाही……. झोपूच काय……..  पण साधं पेंगू सुद्धा दिलं नाही…

कुठलंही सिस्टम, वर्क प्लेस  म्हटलं की राजकारण, हेवेदावे, चढउतार हे आलेच.

पण का कुणास ठाऊक? वर्गाच्या चौकटीआत शिरताना ते सगळं सगळं टेन्शन दाराबाहेर ……… 

लेखिका – संध्या शिंदे

(अंबाजोगाई जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षिका)

प्रस्तुती : सुश्री मीनल केळकर 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ बाबा…अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

? मनमंजुषेतून ?

☆ बाबा…अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

हाफ चड्डीत सायकलच्या पुढच्या दांडीवर एका बाजूला दोन पाय टाकून तिरका बसायचो आणि बाबा अंगातला सगळा जोर लावून पायडल मारत सायकल पुढे न्यायचे. त्यावेळी मला फक्त सायकलला झूम करून येणारा वेगच समजायचा आणि मन सुखावून जायचं.. त्यामागे बाबांनी दातओठ खाऊन लावलेला तो जोर कधी जाणवलाच नाही! संसाराचा सगळा गाडा त्यांनी आणि आईनी असाच जोर लावून पुढे नेला. मला समजला तो माझ्या आयुष्याला मिळत राहिलेला वेग… समजली ती फक्त माझी होत असलेली प्रगती – शारीरिक वाढीतली, खेळातली, स्पर्धांमधली,  शिक्षणातली, व्यवहारज्ञानातली… आणि मी अभिमानानं सुखावत गेलो… त्यामागे आई-बाबांनी लावलेला जोर त्यांनी कुठून आणि कसा आणला हे समजलंच नाही.

ते वयच नव्हतं बहुदा, हे असलं काही समजून घेण्याचं. पण कालचक्राला सगळं समजतही असतं आणि उमजतही! प्रत्येक गोष्टीत बाबांना गृहीत धरणारा, ते आहेत, ते बघतील, ते करतील असं म्हणणारा मी अलगद स्वतः बाबांच्या भूमिकेत कधी शिरलो, समजलंच नाही.

तेव्हा आम्ही फरशीवरच्या बाजारात गणपती बाप्पा आणायला जायचो. ही मूर्ती घेऊ की ती घेऊ असं व्हायचं. वेगवेगळ्या मूर्ती बघत असताना त्यातून आपल्या घरी कुठली  न्यायची याची निवड माझं ‘वय’ करायचं तर बाबांचा अनुभव आणि सुजाणपणा ती निवड करायचा. ” पण बाबा ती कित्ती मस्त आहे? ती मूर्ती का नको? ” असा हट्ट करणारा, प्रसंगी रडणारा मी, ” अरे! ही बघ ही घेऊया. ती छान आहे, पण ती नाही चालणार आपल्याकडे.” हे उत्तर ठामपणे कधी देऊ लागलो समजलंच नाही.

” बाबा आज मी करू देवपूजा ?” ” बाबा आज मी करू बाप्पांची आरती? ” अशी हट्टपूर्वक विनंती करणारा मी कधी या सगळ्या गोष्टींना सरावलो समजलंच नाही.

–आणि “अजून थोडा मोठा झालास की कर “, “अरे हात दुखतील तुझे ताम्हन धरून, थोडा मोठा झालास की करायचीच आहे आरती,” असं म्हणणारे बाबा, अलगद आरतीच्या वेळी गर्दीत सगळ्यात मागे जाऊन कधी उभे राहू लागले तेही समजलंच नाही.

आज वयाच्या अशा नेमक्या टप्प्यावर आलोय की सगळा पट उलगडल्यासारखा वाटतोय. मला पडणारे प्रश्न माझ्या मुलाला पडू लागलेत, मी करायचो तो हट्ट मुलगी करू लागलीये. आणि त्यावेळी  बाबा द्यायचे तशी उत्तरं माझ्या तोंडी आलीयेत.

आजही बाप्पा आणायला आम्ही एकत्र जातो. ‘ सायकल ‘ची जागा आता ‘ फोर व्हीलर ‘ नं घेतलीये. पण ” तुम्ही या घेऊन, मी हिच्याबरोबर घरी थांबून स्वागताची तयारी करतो,” असं बाबा कधी म्हणायला लागले समजलंच नाही.

आरतीचं ताम्हन मला जड होईल, असा विचार करणाऱ्या बाबांना, आज चार आरत्या पूर्ण होईपर्यंत सलग उभं राहणं जड होऊ लागलंय. त्यांचा तो जोर कधी, कसा निघून गेला समजलंच नाही.. 

बाबा …  मला सायकलच्या दांडीवर बसवून वेगात पायडल मारण्याचा तो जोर तुम्ही कुठून, कसा आणला होतात, आणि तो कधी, कसा निघून गेला समजलंच नाही. पण तो जोर गेला कुठे?– याचा उलगडा झालाय मला..

तो सगळा जोर तुम्ही माझ्या मनगटात भरलाय आणि ती सगळी जिद्द मला वारसा म्हणून दिलीये हे आता मला नक्की समजलं आहे!

आजही मला तुम्ही खूप आवडता…. अगदी गणपती बाप्पांइतकेच !!!!

{सर्व बाबा लोकांना समर्पित.}

लेखक –  अज्ञात

संग्राहक – श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

चंद्रपूर,  मो. 9822363911

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉ. रॉबर्ट्स— आमचा शेजारी ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले

 ? मनमंजुषेतून ?

☆ डॉ. रॉबर्ट्स— आमचा शेजारी ☆ डॉ. ज्योती गोडबोले☆ 

सातआठ वर्षांपूर्वी अमेरिकेला लेकीकडे गेले होते तेव्हाची गोष्ट.

मुलीच्या शेजारी नवीन झालेल्या घरात  एक नवीन  कुटुंब खूप सामान उतरवताना दिसले. आफ्रिकन अमेरिकन कुटुंब दिसत होते ते. खूप मोठा ट्रक भरून सामान येत होते. ३ लागोपाठची मुले, आईवडील असे दिसले. 

इकडे लगेच शेजाऱ्याच्या घरात घुसून चौकश्या करायची अजिबात पद्वत नाही. पण चार दिवसानी तो तरुण शेजारीच आमच्या घरी आला. अतिशय अदबीने बोलत होता आणि मी डॉक्टर आहे म्हटल्यावर सहज त्याने सांगितले की तो  oncologist म्हणजे कॅन्सर तज्ञ आहे आणि त्याची बायको आहे स्त्रीरोगतज्ञ. हे ऐकून तर आमचे डोळेच मोठे झाले. आधीच अमेरिकेत डॉक्टर तुफान पैसा मिळवतात, आणि त्यात हा कॅन्सर तज्ञ म्हणजे विचारूच नका.

हळूहळू त्यांची मुले बॅकयार्डमध्ये खेळताना दिसली. मुलगी मोठी होती आणि दोन मुलगे लहान. एक माझ्या नातीएव्हढाच असेल.डॉमिनिक त्याचे नाव. बोलता बोलता डॉ. रॉबर्ट्सने सांगितले, की हे लोक मूळ जमैकाचे.

त्याच्या आई वडिलांनी अतिशय कष्ट करून या मुलांना न्यूयॉर्कमध्ये आणले. हा डॉ.रॉबर्टस खूप हुशार होता म्हणून तो शाळेत तरी जाऊ शकला. अफाट कष्ट आणि फार उत्तम  ग्रेडस मिळवून तो डॉक्टर झाला. तिथेच त्याला ही  सिंथिया भेटली. तीही अशीच हैतीहून आलेली गरीब मुलगी. पण जिद्दीने डॉक्टर झाली आणि पुढे स्त्रीरोगतज्ञ सुद्धा.

मला फार कौतुक वाटायचे या डॉक्टरचे. दिवसभर राबून घरी आला,की कपडे बदलून लागलाच बागेत कामाला. खूप छान छान झाडे आणली त्याने आणि राबराबून स्वतः लावली देखील. त्याला  बाहेरची माणसे बोलावून बाग करणे अशक्य होते का?– मी त्याच्याशी  बोलताना आमच्या कंपाऊंड मधून विचारायची हे. तो हसून म्हणाला,” ग्रँडमा, हा माझा आनंद आहे. माझा  स्ट्रेस रिलीव्हर आहे ही बाग. मला खूप आनंद मिळतो चिखलात हात भरले की.”   

हळूहळू डॉ.रॉबर्ट्सची बाग सुंदर रूप घेऊ लागली. त्याने लावलेल्या गुलाबांना अक्षरशः शंभर शंभर कळ्या आल्या. त्या उमलल्यावर तर  त्या झाडाचे देखणे रूप नजर ठरेना इतके सुरेख दिसू लागले. मला या तरुण मुलाचे फार  कौतुक वाटायचे.

या उलट त्याची बायको ! सिंथिया कधीही बागेत काम करताना दिसली नाही. तिला मी एकदा विचारले तर हसून म्हणाली,”ओह। तिकडे हॉस्पिटलमध्ये कामाने दमून जाते मी आणि घरी ही तीन पोरे कमी देतात का त्रास. मला नाही आवड बागेची . रॉबर्ट्स करतोय ते बास झाले.” 

तो  रॉबर्ट्स असा सज्जन की कधीही मदतीला बायकोला बोलवायचा नाही .तीही पठ्ठी खुशाल त्याला बोलवायची आणि म्हणायची,” डिअर, जरा पिझा लावतोस का ओव्हनला? मी जरा  वाचणारे उद्याच्या पेपर  प्रेझेंटेशनचे.” 

बिचारा निमूट हात धुवून आत जायचा – अदिती  म्हणायची, “ बघ बघ, .किती गुणी कामसू नवरा आहे. मनात आणले तर आपल्यालाही विकत घेईल तो. काय भारी पगार असेल ना त्याला? पण किती नम्र आहे बघ.” 

सिंथिया बाई जरा आळशीच होत्या. या तीन मुलांसाठी त्यांनी घरी २४ तास राहणारी गोरी मेड ठेवली होती. तिला वेगळी स्वतंत्र कार दिली होती. बघा तरी, एक काळा माणूस चक्क गोऱ्या लोकांना नोकर म्हणून ठेवू शकत होता.

खूप पगार तो सहज देऊ शकत  होता तिला.. ही गोष्ट पण कौतुकाचीच होती ना? मला हेही भारी कौतुक वाटले. 

पूर्वी वाचलेले ‘ एक होता कार्व्हर ‘ पुस्तक आठवले ,आणि त्या गरीब बिचाऱ्या बुकर टी.वॉशिंग्टनने अफाट सोसलेले कष्ट आठवून डोळ्यात पाणीच आले माझ्या. आज त्यांच्याच  वंशातला एक मुलगा, एक गोरी बाई सहज  नोकर म्हणून ठेवू शकतो हे केवढे कौतुक… आम्हाला या कुटुंबाचे नेहमीच कौतुक वाटायचे.

सिंथिया एकदा आमच्या घरी केक घेऊन आली होती. वर म्हणते, “ मी नाही हं केला.मला तितकीशी आवड नाही स्वयंपाकाची. डॉ.रॉबर्ट्सने केलाय. “— मनात म्हटले,’ बायो,अग किती ग गुणी नवरा मिळालाय तुला.” 

मग आम्ही तिच्या बाउलमध्ये साबुदाण्याची खिचडी पाठवली. लेक म्हणत होती, “ आई,कमालच आहे तुझी बाई. हे खिचडी बिचडी त्यांना आवडेल का तरी? आपण देऊ  कुकीज. उगीच काय तुझे काहीही.” 

मी म्हटले “ देऊ या ग.नाही आवडले तर न का खाईनात.”—  दोन दिवसानी हातात एक वही पेन्सिल घेऊन डॉ सिंथिया घरी आली.–“ ते काय होते केलेले ?ते डॉ.रॉबर्ट्स आणि माझ्या डॉमिनिकला खूप आवडले. काय आहे त्याचे नाव? त्याची रेसिपी सांगा ना प्लीज. मी करीन घरी.” 

मी मनातल्या मनात कपाळावर हात मारून घेतला. आता हिला मी साबुदाणा कुठे मिळतो इथपासून तो कसा भिजवायचा हे कसे काय सांगू .मी तिला म्हटले “ सिंथिया,बाई,ही रेसिपी इंडियन आहे,तुला जमणार नाही ग. जेव्हा केव्हा खावीशी वाटेल तेव्हा मला सांग.मी देईन करून.”

सिंथिया हसली आणि म्हणाली,” ओह! Seems difficult hmm।  ग्रँडमा, please u do it for me hmm.”

लाघवी होती खरी पोरगी. नंतरही आम्ही अनेकवेळा खिचडी करून दिली, आणि डॉमिनिक आणि त्याचा डॅडी  आम्हाला,’वावा’ असे हात करून दाद द्यायचे.

अदिती नेहमी म्हणायची, ‘ डॉ.रॉबर्टस इथे नक्की राहणार नाही. तो खूप मोठ्या आलिशान,४ गराज असलेल्या घरात शिफ्ट होईल बघ लवकरच. तो नक्की त्यांच्या हॉस्पिटलजवळ असलेल्या खूप  भारी आणि रिच कम्युनिटीमधेच घर घेणार एक दिवस. आमचीही कम्युनिटी आहेच भारी आणि उच्चभ्रू, पण हा याहूनही खूपच श्रीमंत वस्तीत जाणार बघ.” – अगदी तसेच झाले . मी भारतात परत आल्यावर काहीच महिन्यात रॉबर्ट्स कुटुंब  तिथून हलले.

त्यांनी अदितीच्या कुटुंबाला त्यांचे नवे घर बघायला बोलावले होते. अदिती म्हणाली, “ काय सुंदर आहे घर त्यांचे.

केवढेच्या केवढे प्रचंड. लेक साईडजवळचे, राजवाड्यासारखेच—इथे असली घरे प्रचंड किमतीलाच मिळतात.

डॉ.रॉबर्ट्स ने अतिशय हौशीने सजवलेही आहे फार सुरेख. तू आलीस की तुला घेऊन ये असे नक्की स्पेशल आमंत्रण आहे बरं तुला. “ 

कधी मी जाईन का नाही हे मला माहीत नाही, पण जमैकासारख्या ठिकाणाहून आलेल्या एका जिद्दी डॉक्टरची ही  झेप मला खरोखर फार कौतुकास्पदच वाटली.

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ विश्वस्त  – लेखक – श्रीरंग खटावकर ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? मनमंजुषेतून ?

विश्वस्त  – लेखक – श्रीरंग खटावकर ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

आमच्या सोसायटीतले जोशी आजी आजोबा, खाऊन पिऊन सुखी, दोन्ही मुलं अमेरिकेत. इथे आजी आजोबा मजेत. परवा काही कामानिमित्त त्यांच्याकडे गेलो तर आज्जी चक्क लॅपटॉपच्या समोर बसलेल्या ! 

म्हंटलं “आजी काय करताय !”

” काही नाही रे फेसबुकवर फोटो अपलोड करतेय, भजनी मंडळाचे !”

मी तीनताड उडालो. ” आजी तुम्ही फेसबुकला आहात? “

“ मग ! वाटलं काय तुला ! व्हाट्सप पण वापरते मी. आणि हे आजी काय रे?  ग्रॅनी म्हण! “

मी अवाक–आं !! म्हंटलं, आजोबा– sorry, ग्रॅंडपा कुठे गेलेत ? “

” गेलेत मार्केटला, बरमुडा का काय आणायला.”

माझा चेहरा बघून आजी हसल्या म्हणाल्या, ” बस जरा गम्मत दाखवते !”

डुलत डुलत आत गेल्या आणि एक पिशवी घेऊन आल्या. “आमच्या सुशनी पाठवलंय! ” बघितलं तर आत एक पंजाबी ड्रेस ! “अरे पुढच्या महिन्यात जायचंय ना यु एस ला! तयारी हो, तिथे नऊवारीत थंडी वाजते हो, ह्याच्या आत कसे ते थर्मल वेअर की काय ते घालता येतं ना ! “

” काय हो आजी, सॉरी ग्रॅनी तुम्हाला करमतं का हो तिकडे? “

” न करमायला काय झालंय, मला आवडते तिथे, तिथे भारतीय लोकांचा आमच्याच वयाचा एक ग्रुप केलाय. सगळे दर वीकएंडला भेटतो आणि धम्माल करतो. पॉटलक करतो, बर्थडे साजरे करतो, साठी, पंच्याहत्तरी, सहस्त्रचंद्रदर्शन अगदी सगळं करतो.  काही तिथेच स्थायिक झालेले, काही आमच्या सारखे……. वारकरी.”

” तिथे भेटताना अट एकच ! घरची गाऱ्हाणी कोणी सांगायची नाहीत. मग काय मज्जा मस्तीला तर उत येतो. तुला म्हणून सांगते, कोणाला सांगू नकोस हो, नाहीतर धपाटा घालीन.”

“बोला ना “

खुसपुसत म्हणाल्या, ” अरे गेल्या वेळी एकीचं बेबी शॉवर होतं, म्हणजे डोहाळजेवण. असा बावळटासारखा बघू नकोस. तर तिथे एका म्हातारीने मला टकीला की काय म्हणतात ना ती पाजली. आणि मी लागले ना झिंगायला ! 

बरं झालं तिने मला आत नेऊन झोपवलं, नाहीतर काय धिंगाणा केला कोणास ठाऊक? तरी हे दुसऱ्या दिवशी 

माझ्याकडे संशयाने बघत होते, मी आपलं तोंड लपवले.” असं म्हणताना त्या गोडश्या लाजल्या. आणि इथे हे ऐकताना माझी हसून हसून पुरेवाट!

” काय हो आजी हल्ली सकाळी तुम्ही फिरायला जाताना दिसत नाही?”

“अरे नाही उठवत रे, रोज रात्री आमच्या नातवंडांशी चॅटिंग फिटिंग करतो दोघं आणि मग झोपायला उशीर होतो.  आणि जाऊन तरी करायचंय काय तिथे, सुनेच्या, जावयाच्या कागाळ्याच ऐकायच्या ना ! नाहीतर तब्बेतीची रडगाणी ! अरे आता त्या गुप्तेआजी ! सून इतकी चांगली आहे. डॉक्टरेट केलंय, पण ह्या म्हणतात की ती घरी पोळीभाजी करत नाही. आता ती तिच्या कंपनीत मोठमोठ्या फाईली उपसत बसेल की पोळ्या लाटेल?” 

” दुसरी ती परांजपीण, सारखं मेलीला काही न काही होत असतं. आज काय अर्धशिशी, उद्या काय बद्धकोष्ठ, तर परवा काय जुलाब. कुठला रोग झाला नाही असे नाही. तरी बरं मुलगाच डॉक्टर आहे. पण हिला वाटतं की माझ्या उशापायथ्याशी सगळ्यांनी बसावं. गेल्या महिन्यात आली होती तेव्हा रडत होती की सारखं पाठीत दुखतंय. अस्सा राग आला. म्हंटलं उडी मार तळ्यात ज्या काठावर बसलोय तिथून, नाहीतर मी ढकलते तुला. तशी घाबरली आणि पळाली घरी. तेव्हापासून मला आजी कट्ट्यावर हिटलर म्हणतात.  मी सांगू का एक गोष्ट तुला, मला नाही आवडत हे सगळं. आपणच मुलांना शिकवलं ना? आणि ती मुलं शिकल्यावर त्याचा उपयोग नको का करायला? सारखं आपलं उणंदुणं काढायचं. आमच्या ह्यांची नोकरी होती फिरतीची, दर पाच वर्षांनी बदली, सारखं संसार मांडा- परत बदला, मुलांचीपण फरफट आमच्याबरोबर, तेव्हा मुलांनी तक्रार केली का? नाही ना? मग आता त्यांच्यामागे आपण गेलो तर कशाला रडायचं. माझी सून तर तिकडचीच आहे. पण तिथे गेले की सगळं छान करते, सुरवातीला पूर्ण अमेरिका फिरवलं आम्हाला, अगदी युरोप टूर पण केली. आणखी काय हवं म्हणते मी. “

” मी तर म्हणते मुलं मार्गी लागली, त्यांची लग्न झाली की आपण ज्येष्ठांनी विश्वस्त व्हावं घराचं,आपल्याला सल्ला विचारला तरच द्यावा, आणि सल्ला दिल्यावर तोच मानला जाईल असा अट्टहास करू नये. त्यामुळे भांडणं कमी होतात. आणि अपेक्षाभंगाचं दुःखही होत नाही. आणि आताच्या जमान्यात, ना आम्ही त्यांच्यावर अवलंबून, ना ते आमच्यावर ! आताच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात या मुलांना खूप माहिती असते, आणि त्यांच्या परीने ते आपली काळजी घेतातच की. आयुष्यात तक्रार न करता आणि दुसऱ्याचं कौतुक करत राहिलं ना की खूपसे प्रश्न चुटकीसरशी सुटतात. “

” चल आवरते आता ! तुझ्याशी बोलत बसले तर कामं कोण उरकणार, आमचा म्हसोबा येईलच एवढ्यात.

चल पळ तू पण!!”

मी निघालो खरा तिथून, पण त्यांचा ‘ विश्वस्त ‘ हा शब्द मनात कुठेतरी खोल जाऊन बसला. किती छान विचारसरणी ना ? 

— असे जर विचार आपल्या सगळ्याच ज्येष्ठांनी केले तर त्यांचे कितीतरी प्रश्न हे प्रश्नच राहणार नाहीत.

लेखक – श्रीरंग खटावकर

संग्राहक – सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ सत्यासत्य ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? मनमंजुषेतून ?

सत्यासत्य ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री  ☆

जे आहे ते सत्य आहे; शब्दरूप घेऊन आले की ते असत्य होते’. 

आपल्या शिष्याला गीतेतील जीवनाचे तत्वज्ञान समजावून सांगतानाच्या वेळेचे हे साईबाबांचे उद्गार ! यातून बाबा केवळ भगवद्गीतेतील श्लोकाचेच विवरण करतात असे नाही, तर ते त्याबरोबरच संभाषण शास्त्र आणि कला यांचे मूलतत्व सांगतात. 

संभाषण हे मूलतः आपण व्यक्त होण्याचे, दुसऱ्याशी संपर्क साधण्याचे एक साधन आहे. आपण दुसऱ्यापाशी व्यक्त होतो म्हणजे काय करतो? आपण आपल्या मनातील काहीतरी समोरच्याला सांगतो. कसे? त्या बाबीवरील आपले ज्ञान दुसऱ्याच्या विश्वातील अनुभवांच्या जवळातजवळ जाऊन सांगायचा प्रयत्न करतो. जेव्हा बोलणाऱ्या व्यक्तीचे आणि ऐकणाऱ्याचे अनुभव विश्व एकच असते (जे फारच क्वचित घडते) तेव्हा हे अतिशय सुलभ होते. मात्र या दोघांच्या अनुभव विश्वात जितकी तफावत अधिक तितके हे कठीण होत जाते—आपण एका साध्या उदाहरणातून पाहू या—

माझ्या समोर गुळाचा खडा आहे. समोरच्याला हे काय आहे ते माहिती नाही. आता होणारे संभाषण कसे असेल?

‘ हे काय आहे?’

‘ गूळ ’

‘ याचं काय करायचं? ’

‘ हा खायचा.’

‘ कसा लागतो तो?’

‘ गोड ’

‘ गोड म्हणजे? ’ 

‘ तू साखर खाल्ली आहेस ना? साखर गोड असते.’ 

‘ म्हणजे गूळ साखरेसारखा लागतो? ’ 

(पाहिले ना सत्याचे शब्दरूपात कसे असत्य झाले!)

‘ तसे नाही रे. करंजी गोड असते.’

‘ म्हणजे हा करंजीसारखा लागतो?’ (आणखी एक असत्य!)

आता कितीही पदार्थांची नावे सांगितली तरी गुळाची चव त्यांचापेक्षा वेगळीच असणार ना ! मग किती असत्य सांगायचे?

‘आपल्या जिभेवर जे विशिष्ट रससंवेदक असतात ते जेव्हा चेतविले जातात ती चव,’– मी शास्त्राचा आधार घेतला आणि तो माझ्याकडे मोठा आ वासून भूत बघितल्यासारखा पाहू लागला. आता कशी समजावून सांगू मी त्याला गुळाची चव? त्याच्या अनुभवविश्वातून सगळ्या पदार्थांची यादी सांगूनही मला गुळाची चव सांगता येत नव्हती. 

अखेरीस मी त्याला म्हटले, ‘ तू खाऊन बघ ना, म्हणजे तुला समजेल याची चव.’ 

किती सोपा मार्ग ! पण इथे शब्द कुचकामी ठरले, कारण मी त्याला त्याची निश्चित अनुभूती देऊ शकत नव्हतो. म्हणजेच जे अनुभूतीजन्य असते ते सत्य असते आणि त्याला शब्दरूप द्यायचा प्रयत्न केला की ते असत्य होते. अध्यात्मिक भाषेत सांगायचे तर हा ‘ संप्रज्ञात आत्मसाक्षात्कार ‘ आणि ‘ असंप्रज्ञात आत्मसाक्षात्कार ‘ यांच्यातील  फरक आहे. प्रज्ञेच्या आधाराने झालेले ज्ञान हे कधीच निर्भेळ असू शकत नाही – संपूर्ण सत्य असू शकत नाही; ते अनुभूतीजन्यच असले पाहिजे. 

म्हणूनच संभाषणात शाब्दिक संभाषणापेक्षा चेहेऱ्यावरील आणि नजरेतील भाव व देहबोली अधिक परिणामकारक ठरतात. अन्यथा ‘ मला असे म्हणायचे होते की ….’ किंवा ‘ पण मला असं नव्हतं म्हणायचं ….’ असे सांगायची वेळ येते. 

संपूर्ण सत्य हे केवळ अनुभवजन्यच असते. ते शब्दरूप घेऊन आले की भेसळीने त्याचे असत्य होते. 

‘जे आहे ते सत्य आहे; शब्दरूप घेऊन आले की ते असत्य होते’.

©️ डॉ. निशिकान्त श्रोत्री

९८९०११७७५४

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मानाचा सॅल्युट… ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? मनमंजुषेतून ?

मानाचा सॅल्युट… ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

आज उद्या सुट्टी. नुकतचं मोठं मंगलकार्य पार पडल्यानंतचा शीण आलाय. गणपतीगौरी विसर्जनानंतर आलेला हा मानसिक आणि शारीरिक थकवा असतो.

घरच्या गौरीगणपतींचं विसर्जन झालं आणि घर सुनं सुनं वाटायला लागलं. घरं जरी सुनं सुनं झालं तरी जरा बाहेर पडलं की चौकाचौकात बसलेले गणपती, त्या भोवतालची आरास, स्पिकरवरील भक्तीगीतं आणि आरत्या ह्यामुळे उत्साहवर्धक मंगलमय वातावरण होतं.

काल अनंतचतुर्दशी झाली. गावातील  बाप्पांच्या मुर्तींचं पण विसर्जन झालं आणि मग खरोखरच सगळं शहर निस्तेज, शांत भासायला लागलं. सणसमारंभ आटोपले की एक प्रकारचं चैतन्यच नाहीसं होतं, एक मरगळ आल्याचा फील येतो.

हा सण सुखरूप, निर्विघ्न पार पडल्यानंतर सर्वप्रथम आभार मानायचे तर त्या पोलीस खात्याचे आणि रहदारी वर नियंत्रण ठेवणा-या ट्रॅफिक पोलिसांचे मानावे लागतील. खरंच किती ताण येतं असेलं नं ह्या दोन्ही खात्यांवर. गणपतीच्या मिरवणूकीतील गर्दीवर नियंत्रण ठेवणे, नागरिकांच्या सुरक्षेबाबत सतर्क असणे, ह्या प्रकारची अनेक महत्त्वाची कामे अक्षरशः तहानभूक विसरून पण पार पाडावी लागतात. ही कर्तव्ये पार पाडतांना बरेचदा त्यांना वैयक्तिक अडचणींकडे कानाडोळा करावा लागतो.

अमरावतीमध्ये गणपती आणि नवरात्रात चिक्कार गर्दी असते. गणपती बघायला आणि नवरात्रात देवींच्या दर्शनासाठी आजुबाजुच्या कित्येक गावागावांतून कुटूंबासहित लोक येतात. या सगळ्याचा प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष ताण हा पोलीस खातं, वाहतूक नियंत्रण खातं आणि आरोग्य खातं ह्यावर येतोच. कितीतरी पोलीस पुरुष व महिला कर्मचारी सुध्दा ही गर्दी आटोक्यात आणण्यासाठी तैनात असतात. ह्या कालावधीत ह्या खात्यातील कर्मचाऱ्यांना अजिबात रजाही मिळत नाही. कितीतरी वेगवेगळ्या प्रकारची कामे ह्या खात्यातील कर्मचाऱ्यांवर सोपवलेली असतात. गर्दीला आटोक्यात ठेऊन भक्तांची नीट रांगेत व्यवस्था करणे, कुणी लहान मूल चुकून त्या गर्दीत हरविले तर त्याला सुखरूप त्याच्या पालकांपर्यंत पोहोचविणे, वयोवृद्ध मंडळींकडे जातीने काळजीपूर्वक लक्ष पुरविणे, गर्दीचा फायदा घेऊन घुसलेल्या भुरट्या चोरांचा मागोवा घेणे, एकाच जागी जास्त व्यक्तींना वा वाहनांना थारा न देणे, आणि ही सगळी व्यवस्था त्यांना लगातार आठ दहा घंटे सतत फिरस्ती राहून चोख बघावी लागते. खरंच सलग इतके घंटे उभ्याने काम करुन अक्षरशः पायाचे तुकडेच पडत असतील त्यांच्या .

गणपतीत दहा दिवस, आणि मध्ये जेमतेम पंधरा दिवस तीन आठवडे उलटले की परत नवरात्रात सलग नऊ दिवस पुन्हा तीच व्यवस्था बघणे हे अतिशय अवघड, कष्टाचंच काम आहे. ही व्यवस्था बघतांना ते कर्मचारी तहानभूक विसरून ऊन,पाऊस ह्याची पर्वा न करता इमानेइतबारे आपले कर्तव्य बजावीत असतात. शिवाय वेगवेगळ्या निवडणूकांच्या काळात देखील ह्यांच्या संयमाची कसोटीच लागत असते. 

शेवटी काय प्रत्येक ठिकाणी व्यक्ती तितक्या प्रकृती .एखाद्या वाईट अनुभवाने सगळ्या खात्यालाच त्या पँरामीटर मध्ये तोलणे योग्य नव्हे. शेवटी ती पण आपल्यासारखीच हाडामाणसाची माणसे हो. त्यांना पण त्यांच्या आरोग्याच्या, वैयक्तिक, कौटुंबिक विवंचना ह्या असतातच.पण तरीही मनापासून सेवा देणा-या ह्या खात्यातील समस्त कर्मचाऱ्यांना मानाचा सँल्युट.  

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ काष्ठशिल्पाची कथा… ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले

 ? मनमंजुषेतून ?

☆ काष्ठशिल्पाची कथा… ☆ डॉ. ज्योती गोडबोले 

नारायण धारप, रत्नाकर मतकरी, या सिद्धहस्त लेखकांची मी जबरदस्त चाहती. त्यांच्या भयकथा, त्यातली पात्रे, त्या आफ्रिकेतली गूढ वर्णने, ते वाडे– सगळे मनावर विलक्षण गारुड करतात. असा त्यांचा एकही कथासंग्रह नसेल,जो मी वाचला नसेल. सांगायचे कारण, ते लिहितात त्या सगळ्याच काही कपोलकल्पित गोष्टी नसतात. काही सत्यकथाही असणारच—-कारण मलाही एकदा असाच एक भयंकर अनुभव आलाय—–

—–  गोष्ट आम्ही युरोप टूरला गेलो तेव्हाची. त्यालाही झाली  सहज १५  वर्षे. आम्ही तेव्हा फ्लोरेन्सला गेलो होतो.

तिथून पिसाही फार लांब नाही. आम्ही पिसाचा झुकता मनोरा बघितला,आणि हिरवळीवर छान पाय पसरून बसलो.

 रोम, इटलीला आफ्रिकन लोक फार मोठ्या संख्येने दिसतात. नाना वस्तू ते विकताना आढळतात. मी आणि माझी बहीण अशा दोघीच एका कंपनीबरोबर टूरला गेलो होतो.

“ ताई,चल ना जरा मार्केट मध्ये चक्कर मारू “, स्मिता म्हणाली.

बाकीचे लोक म्हणाले,’ जा तुम्ही,पण लवकर या बरं का.उगीच कुठे चुकलात तर पंचाईत होईल.’ 

आम्ही मार्केट बघायला निघालो. काय सुरेख सुरेख वस्तू मांडून ठेवलेल्या होत्या. अर्थात युरोमध्ये किमतीही अफाटच होत्या म्हणा. नुसत्या की चेन्स दहा युरो खाली नव्हत्या. अतिशय सुंदर, लेदरच्या टोट बॅग्स बघूनच समाधान मानावे.

पुढे गेलो तर दोन आफ्रिकन मुले अतिशय गुळगुळीत केलेले असे टेबलवर ठेवायचे लाकडी मोठे शोपीस विकत होती. काय सुरेख होते ते केलेले. काळेभोर शिसवी लाकडाचे. पाच गुळगुळीत डोके असलेले पुरुष एकमेकांना वेढून गोल करून वाकून उभे होते—-असे ते सुंदर काष्ठशिल्प बघून मी थबकलेच. मला अतिशय आवडले ते  .आमच्या हॉलमधल्या सेंटर टेबलवर काय मस्त दिसेल हे, असा विचारही आला मनात. मी जवळ जाऊन बघितले,तर त्यांचे चेहरे क्रूर वाटले मला. पण तरी मी त्या मुलाला विचारून उचलून बघितले ते शिल्प— आणि माझ्या अंगावर एकदम भीतीचा काटा उभा राहिला. मी ते पटकन खाली ठेवले—

— मला अशा  संवेदना,इतरांपेक्षा जास्त  तीव्र होतात आणि लगेचच समजते की हे चांगले नाही. हा सेन्स मला अगदी लहानपणापासूनच आहे. मला जाणवत होते की ते काष्ठशिल्प अगदी वाईट शक्तीने भारलेले आहे. पण तरीही मला ते घ्यायचा मोहच होत होता. तो मुलगा त्याची किंमत खूप कमी करायलाही तयार होता. मला तर तीव्रपणे असे जाणवले   की कसंही करून ते विकून त्याला मोकळं व्हायचंय.

मी त्याला विचारले, “ हे कुठून आणलंय तुम्ही? ”

सुदैवाने त्याला बऱ्यापैकी इंग्लिश येत होते. म्हणाला की असेच कोणीतरी त्याला विकलेय. “ पण तुम्ही घ्या ना हे. बघा ना किती सुंदर काम केलंय, अगदी गुळगुळीत केलंय. तुम्ही कुठून आलात? इंडिया का ? इंडिया चांगला देश आहे   असं ऐकलंय मी.” तो म्हणाला.  

मी पुन्हा त्या पुतळ्यांच्या चेहऱ्याकडे बघितले. माझ्या डोळयांसमोर अचानक अंधार आला— एकदम एखाद्या गूढ जंगलात कसले तरी पडघम  वाजताहेत असा भास झाला. पण काही केल्या मला त्या पुतळ्यासमोरून हलताच येईना. आता तर मला त्यांच्या चेहऱ्यावर रागाचे भाव स्पष्ट दिसत होते.  माझी बहीण स्मिता शेजारीच उभी होती.

तिलाही असं काहीतरी वेगळंच जाणवलं असावं. तिने माझा हात ओढला आणि म्हणाली, “ ताई नको घेऊ हे . फार भयानक दिसतंय. किती हिडीस दिसतायत ही माणसं. कसा काय आवडलाय हा पुतळा तुला .शी…. अजिबात नको घेऊ हं. “ 

त्या मार्केटमध्ये आम्हीच दोघी उरलो होतो. बाकी लोक निघून गेले होते. तो मुलगा तर आता असं म्हणायला लागला होता की “ मी हे तुम्हाला गिफ्ट देतो, पण हे घ्याच तुम्ही.”  तो ते माझ्या हातात कोंबूच लागला. आणि माझ्या अंगावर भीतीच्या लाटा  उसळू लागल्या—स्मिताला काहीतरी जाणवले. तिने माझा हात घट्ट धरला आणि म्हणाली, “ ताई इथे नक्की काहीतरी गडबड आहे. आपण अगदी मूर्खासारख्या उभ्या आहोत.– लवकर पळ इथून.” —-

तिने मला तिथून अक्षरशः खेचत पळत न्यायला सुरुवात केली . तरी मी मागे ओढ घेतच होते.

“ थांब ना !आपण घेऊया की ग तो गिफ्ट देतोय तर.” मी मागे बघत बघत म्हणत होते. स्मिताने आता धावायला सुरुवात केली. परका प्रदेश– परकी भाषा– रस्ते– काहीच माहीत नव्हतं .आणि आतातर आम्ही कुठे आलोय हेही आठवेना. तिने मला कसेतरी फरपटत लांब नेले. तो मुलगा हातवारे करून बहुतेक आम्हाला त्याच्या भाषेत वाईट शिव्या देत होता. धावत धावत आम्ही आमच्या लोकांना येऊन भेटलो तेव्हा जीव भांड्यात पडला स्मिताचा.

तरीही मी म्हणतच होते तिला, “ अगं, निदान परत एकदा जाऊन नुसतं बघून तरी येऊया. किती सुंदर केलेय ग ते.” 

आमच्या ग्रुपमधल्या लोकांनाही हे माझं सगळं काहीतरी वेगळं चालल्याचं जाणवलं असावं. त्यांनी घाईघाईने मला कडक कॉफी दिली आणि लगेचच आम्ही बसमध्ये बसलो.

सुदैवाने आमचा तिथे रात्री मुक्काम नव्हता. रात्री मला फणफणून ताप भरला. मलाच विचारून स्मिताने माझ्या बॅग मधल्या गोळ्या मला दिल्या. मला गाढ झोप लागली. स्मिताने सकाळी मला उठवलं—” ताई, बरं वाटतंय का?” 

“ हो मस्त वाटतंय ! का ग?” 

 “ का ग काय? मूर्ख कुठली। रात्रभर मी जागत बसलेय तुझ्या जवळ. काय बोलत होतीस अग रात्रभर. कोणत्या तरी अगम्य भाषेत कोणाशी तरी जोरजोरात वाद घालत होतीस. मला इतकी भीती वाटत होती ना ताई. मग कधीतरी तुझं ते विचित्र बोलणं थांबलं आणि तुला झोप लागली. नाही तर मी खरंच कोणालातरी आपल्या रूममध्ये झोपायला बोलावणार होते.– ताई,अग हे सगळे त्या पुतळ्याचे प्रताप बाई. काहीही नाहीये का आठवत?” 

“ नाही ग. पण सॉरी स्मिता !खूप  त्रास दिला ग मी तुला.खरंच सॉरी! पण तो पुतळा बघितल्यावर मला काहीच सुचेना.

जणू मोहिनीच पडली मला त्याची. कुठंतरी जाणवत होतं की ती वाईट शक्ती आहे. पण तरीही जणू ते शिल्पच म्हणत होतं की ‘ घे मला ‘. खरं सांगते आहे. “ 

स्मिता म्हणाली ,” अक्षरशः ओढत ओढत आणलं तुला तिथून.” पण मला हेही आठवत नव्हतं .

 मग आम्ही तिथून आणखी दुसऱ्या शहरात गेलो. नंतर पुन्हा मला असा काहीच त्रास झाला नाही. आमची सगळी ट्रीप खूपच सुंदर झाली.

आमच्या ग्रुपमधले नव्याने  दोस्त झालेले लोक म्हणाले, ‘ काय ज्योतीताई, आम्ही पण काय घाबरलो होतो त्या दिवशी. स्मिताताईंची तर वाटच लागली होती.” 

— मला  मात्र हे काहीही आठवत नाही. मी तो पुतळा बघितला एवढेच मला आठवते. पुढचे काहीही नाही.

म्हणूनच नेहमी लक्षात ठेवावे— परक्या माहीत नसलेल्या ठिकाणी  काही घेऊ नये असे आपले पूर्वीचे जुने लोक सांगतात ते मुळीच चुकीचे नाही— हा अनुभव तर हे चांगलेच शिकवून गेला मला–आणि स्मिताला पण.

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares