मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ अर्थपूर्ण प्रथा… ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? मनमंजुषेतून ?

☆ अर्थपूर्ण प्रथा… ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सोमवारी संध्याकाळी गौरीगणपतींचं विसर्जन झालं आणि घरं अगदी सुनंसुनं झालं. ह्या विसर्जनाच्या दिवशी सकाळपासूनच एक  हूरहूर लागलेली असते. वास्तविक पहाता माहित असतं बरं का, की हे गौरी गणपती आपल्याकडे पाहुणे म्हणून आलेत. तरीही त्यांच्या विसर्जनानंतर चैन पडत नाही ही पण गोष्ट खरीच. त्यांच्या आगमनाने आपले मन तसंच घरचं वातावरण खूप उत्साहवर्धक झालेलं असतं. घर कसं भरल्या भरल्यासारखं वाटतं.

ह्या सणावारांच्या निमित्ताने का होईना, आम्ही नोकरदार बायका देवासमोर चार घटका जरा शांत बसतो. नैवेद्य कुळाचार ह्या निमित्ताने चार निरनिराळे साग्रसंगीत पदार्थ करतो. ह्या निमित्तानेच आपल्याकडून रितीरिवाज, नेमधर्म पाळल्या जातात. चार माणसे, नातलग,आपले नेहमीचे रुटीन बदलून गौरीगणपतीच्या निमित्ताने एकत्र येतात. अशी  एकमेकांची मनं जुळण्यासाठी, एकमेकांचा सहवास लाभण्यासाठीच जणू ह्या सणावारांचं नियोजन असतं. परस्परांशी एकोप्याने वागणे आणि जमेल तितकी मदत करण्याचा आटोकाट प्रयत्न करतो.

आपण गौरीगणपतींना निरोप देतो खरा, पण निरोप देतांनाच पुढील वर्षी ह्याच मुहूर्तावर परत इतक्याच ओढीनं येण्याची कमिटमेंट घेतो. जणू पुढील वर्षी परतण्याच्या बोलीवरच आपण ह्यांना निरोप देतो. जरी गौरीगणपतींना निरोप देणं अवघडं जातं असलं, तरी ते एक संतुलित आखीवरेखीव ऋतूचक्र आहे हे पण विसरून चालणार नाही. गौरी म्हणजे माहेरवाशिणींचे प्रतिक आणि गणपती म्हणजे घरचा खंदा दिपकच जणू, ज्याला कर्तव्यपूर्तीसाठी एकाच जागी स्थिर राहताच येणार नाही. ज्याप्रमाणे माहेरवाशीण  एकदा माहेरी चक्कर मारून 

येते, तेथील सगळं क्षेमकुशल आहे ह्याची तिची खात्री पटली, की मग तिला आपल्या स्वतःच्या घराची ओढ लागते, त्याप्रमाणेच गौरी ह्याही माहेरवाशिणी. त्या औटघटकाच येणार. पण त्या अल्पकालावधीत पुरेपूर सौख्याचा आणि आनंदाचा शिडकावा करुन जाणार, प्रेमाची, मायेची पखरण करुन जाणार. त्यामुळेच मन त्यांच्या विरहानं जरा झाकोळलं असलं तरी आपल्याला गरज असतांना ह्या मदतीला धावून येणारच ही मनात खात्री आणि विश्वास पण तेवढाच असतो. जरी बाप्पाचे विसर्जन झाले तरी त्याच्या पूजेचा मान हा प्रथमच. त्यामुळे बाप्पाचंही अस्तित्व कायम मनात ठायी ठायी जाणवतं असतं बघा.

आपण गौरीगणपतींना निरोप देतांना शिदोरी म्हणून दहीपोहे किंवा दहीभात व मुरड-कानवला देतो. मुरड-कानवला म्हणजे हलक्या हाताने सारण भरून केलेली करंजी आणि त्याला हाताने घातलेली नाजूक एकसारखी मुरड. मुरड-कानवला दिल्यानंतर देव किंवा व्यक्ती मुरडून, म्हणजेच वळून परत आपल्याकडे येतेच असा समज आहे.

सहज करता येण्यासारख्या गोष्टी, आणि जुन्या प्रथा, ज्या केल्याने आपले नुकसान तर काहीच होत नाही, झालाच तर फायदाच होतो, त्या प्रथा करण्याचा प्रयत्न करावा. अर्थात हे माझे मतं. म्हणून सौ.आईने शिकविलेल्या  गोष्टी– उदाहरणार्थ प्रवासाला, परीक्षेला, महत्वाच्या कामाला निघालेल्या आपल्या माणसांच्या हातावर दही देणे,  तसेच कामानिमित्त प्रवासास बाहेरगावी जातांना देवाजवळ  पैसासुपारी ठेवणे, अशा सहज गोष्टी ज्या माझी आई अजूनही कटाक्षाने पाळते, त्या मनोमन  पटतात.खरचं ह्या प्रथा पूर्ण विश्वासाने केल्या तर अर्थपूर्ण असतात.

परत एकदा गौरीगणपतींना “ कायम आमच्यावर कृपादृष्टी असू द्या “ ही हक्काची विनंती करते. 

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ तटस्थता…लेखक – अज्ञात ☆ संग्राहक – श्री माधव केळकर ☆

? मनमंजुषेतून ?

 ☆ तटस्थता… लेखक – अज्ञात ☆ संग्राहक – श्री माधव केळकर ☆ 

वयाच्या एका टप्प्यावर माणसाला तटस्थता येते. आयुष्यभर माणसांचे, नातेवाईकांचे, मित्रमैत्रिणींचे अनुभव घेऊन प्रगल्भता आलेली असते किंवा ती येते. प्रत्येक गोष्टीकडे, घटनेकडे, प्रसंगाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलतो. घडून गेलेल्या प्रसंगाचे अवलोकन करता येते. हे खरंच घडलं का? मग घडलं तर का घडलं? आपलं काय चुकलं? ह्याचा विचार करण्याची क्षमता वाढते. माफ करण्याची  वृत्ती वाढते. साध्या साध्या गोष्टींवरून येणारा राग आता येत नाही. मनःशांती मिळायला सुरुवात होते. कशाचेही काही वाटेनासे होते. आता हे चांगले का वाईट, हे घडत असणाऱ्या गोष्टी ठरवत असतात. येणारा प्रत्येक प्रसंग किंवा घटना मनाला किती लावून घ्यायची ह्याचे जणू काही  प्रात्यक्षिकच आपल्याला मिळालेले असते. एखाद्या घटनेकडे तटस्थपणे बघता येते. आपली ह्यामध्ये काय भूमिका आहे? ती महत्वाची आहे का? आपल्या मताची गरज आहे का? हे सगळे समजून घेता येते. त्याची उत्तरे मिळत राहतात. जी उत्तरे मिळतात त्याने आपल्याला त्रयस्थपणे वागता येते.  

आता वारंवार डोळ्यात येणारे पाणी थोपवण्याची कला अवगत झालेली असते. आपले कोण परके कोण? किंवा जी आहेत ती खरंच आपली आहेत का? किंवा मग जी होती ती आपली होती का? ज्यांच्यासाठी डोळ्यात पाणी येत होतं  ती माणसे आता दुरावलेली असतात. आपल्याला  हवी तशी माणसे वागतच नाहीत हे समजायला लागतं. मग अपेक्षांचं ओझ हळूहळू कमी होत जातं आणि एक अंतर आपोआपच तयार होते. हा आलेला एकटेपणा जास्त सुंदर असतो. कुणाचेही बंधन नाही, अपेक्षा नाहीत आणि त्यामुळे होणारे दुःख नाही. त्यामुळे वागण्यातला ओलावा आपोआपच कमी होतो. बोलणे कमी होते. कर्तव्य भावनेने काही गोष्टी केल्या जातात. पण त्यातील गुंतवणूक कमी होते त्यामुळे तटस्थता येते.

आपल्या आजूबाजूचा गोतावळा आपोआप कमी होतो. आपले आपण उरत जातो आणि जग जास्त सुंदर होतं.  हा एकटेपणा जास्त सुंदर असतो. जग जास्त सुंदर दिसायला लागतं. खरं म्हणजे ते सुंदर होतंच पण आपण दुसऱ्याच्या नजरेतून बघत होतो. ही आलेली तटस्थता जगायला शिकवते. आजपर्यंत केलेल्या गोष्टी किंवा राहून गेलेल्या गोष्टी करायची एक उमेद देते. कारण आता कसलंही ओझं नसतं. कुणाकडून कसलीही अपेक्षा नसते, कोण काय म्हणेल ह्याची भीती नसते. आपण कुणाला बांधील नसतो. आपल्या कर्तव्यातून आपण मोकळे हौऊ शकत नाही, पण दूर राहून ती करू शकतो हे अनुभवायला येते. ज्या गोष्टींमध्ये विनाकारण गुंतून पडत होतो त्या गोष्टी किती फोल होत्या हे कळते. त्यामुळे आत्मपरीक्षण  केले जाते. 

नव्या आयुष्याला सुरुवात होते. आता माहित झालेलं असतं की कसं जगलं पाहिजे, काय केलं पाहिजे आणि काय केलं नाही पाहिजे. त्यामुळे आयुष्याच्या ह्या टप्प्यावर आलेली तटस्थताही छान वाटू लागते. हे ज्याला कळलं/उमगलं ती व्यक्ती खरंच भाग्यवान.

तर, काहींचे आयुष्य मात्र आम्ही अजूनही शिकतोय !— असे 

आधीच्या पिढीकडून पैसे वाचवायला शिकलो — नंतरच्या पिढीकडून पैसा वापरायला शिकतोय.

आधीच्या पिढीकडून सहवासाने नाती जपायला शिकलो – नंतरच्या पिढीकडून डिजिटली नवीन नाती जोडायला शिकतोय.

आधीच्या पिढीकडून मन मारून जगायला शिकलो –नंतरच्या पिढीकडून मन भरून जगायला शिकतोय.

आधीच्या पिढीने, Use and use more मधली उपयुक्तता शिकवली – नंतरच्या पिढीकडून Use and throw मधली नावीन्याची गंमत अनुभवायला शिकतोय.

आईकडून पिकनिकलाही घरच्या पोळीभाजीची लज्जत अनुभवायला शिकलो – मुलांकडून घरात असतांनाही पिकनिक एंजॉय करायला शिकलोय.

आधीच्या पिढीबरोबर निरांजन लावून दिवा उजळून वाढदिवस साजरा केला – नंतरच्या पिढीबरोबर मेणबत्ती विझवून अंधार करून वाढदिवस साजरा करायला लागलो.

आधीच्या पिढीने बिंबवले, घरचेच लोणी सर्वात उत्तम – नंतरची पिढी पटवून देत आहे, अमूल बटरला पर्याय नाही‌.

थोडक्यात काय, आधीच्या पिढीने शिकवले, अधिक वर्षे कसे जगायचे ते —

तर नंतरची पिढी शिकवत आहे, मरणापर्यंत आनंद घेत कसं जगायचं ते !!

— दोन्हीच कॉकटेल बनवलं तर आयुष्य किती मजेदार असेल…

लेखक – अज्ञात 

प्रस्तुती – श्री माधव केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मोदक… लेखिका – सुश्री शुभदा पाटकर ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆

? मनमंजुषेतून ?

☆  मोदक… लेखिका – सुश्री शुभदा पाटकर ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆

30 रुपयाला एक मोदक? काय मोदकात सोनं वगैरे घालतात की काय? काय ही लूट? तीस रुपयाला अख्खा नारळ मिळतो, त्यात अकरा मोदक सहज बनतात. अशा विचारांची आमची पिढी. नारळाची किंमत तीस रुपये असली तरी बाकीचे पैसे कौशल्याचे आहेत. मोदक बनवणं येऱ्या गबाळ्याचं काम नाही.

श्रावण महिन्यात खाण्यापिण्याची चंगळ असायची.  त्यांचा मुकुटमणी म्हणजे मोदक. श्रावण अखेरीस माळ्यावरून मोदकपात्र काढलं जायचं. हे वजनदार तांब्याचं. मग चिंचेने घासून मस्त लखलखित करायचं. त्या महिन्याच्या वाण्याच्या यादीत आंबेमोहर (जुना) तांदूळ असायचा. हा जुनाच असला पाहिजे, नाहीतर मोदक फसणार. गणेश चतुर्थीच्या आधी चार दिवस हे तांदूळ धुवून आजोबांच्या मऊसुत धोतरावर वाळत पडणार. फक्त आजीच त्यांच्यावरून अधून मधून हात फिरवणार. बाकी कोणी तिकडे जायचं नाही. गिरणीत दळायला द्यायचे; तर  कोणत्या तरी इतर धान्याचे पीठ त्यात मिसळेल म्हणून ते घरीच दळायचे .

जातं धुवा, त्याचा खुंटा शोधा, पीठ गोळा करायची झाडणी शोधा, असा सगळा सरंजाम पूर्ण झाला की आई ते तांदूळ दळणार. आम्ही खरंतर जातं ओढायला मदत करायला उत्सुक असायचो पण तिथे धसमुसळेपणा चालत नाही. विशिष्ट लईत जातं ओढलं तरच तांदळाची पिठी हवी तशी बारीक पडते. चला मोदकासाठी तांदळाची पिठी तयार झाली.

तेव्हा फ्रीज नव्हते त्यामुळे आदल्या दिवशी अर्धी तयारी वगैरे प्रकार नाही. आम्ही अंथरुणात असतानाच नारळ फोडण्याचे आवाज ऐकायला यायचे. हे काम पुरुषांचं .दहा नारळ फोडले तरी खोबरं सहा-सात नारळाचंच पडायचं. कारण ते पांढराशुभ्र असलं पाहिजे, बाकी करवंटी जवळचं खोबरं इतर कामासाठी. आजीच सोवळ्याने चून बनवणार. चून म्हणजे गूळ खोबऱ्याचं सारण. सारण कडक झालं तर मोदक फाटतो .सारण पातळ झालं तर मोदकातून गुळाचा पाक गळतो. त्यामुळे चून जमणं महत्त्वाचं. झोपेत असताना घरभर या चुनाचा सुगंध दरवळायचा. शेवटी त्यात वेलची टाकली की सोने पे सुहागा. खरोखरच जमून आलेलं सारण सोन्याच्या रंगाचे दिसतं. 

या वेळेपर्यंत तीन-चार काकवांच्या (काकूचं अनेक वचन) आंघोळी आटपलेल्या असतात . आजीकडून मोदकाची उकड होईपर्यंत त्या पाटावर बसून युद्धाला सज्ज होतात. आजीची  गादी यांना नंतर चालवायची असते. कशी करते सासू? मोदकाची उकड बघताना यांच्या तोंडाचे पट्टे चालू असतात. ” गेल्यावर्षीचे मोदक छान झाले होते. आता यावर्षीचे कसे होतात बाई देव जाणे वगैरे.” उकळत्या पाण्याच्या आधणात आजी रवाळ तूप सोडते. आता हा वेगळा सुगंध. थोडं मीठ. पाणी चांगलं खळखळ नाचायला लागलं की अधीरतेने तांदळाची पिठी यात उडी घेते .आता एकदम ताकदीने आणि लगबगीने पुढचं काम. वेगाने ढवळण्याचं. हुश्श्श झालं एकदाचं. ही उकड चांगली जमली की अर्ध काम फत्ते. या क्षणी सगळे आवाज बंद झालेले असतात. वारा वाहायचा थांबतो. संपूर्ण जगच ‘स्टॅच्यू’ अवस्थेत. फक्त उकड- बस्स. आजीच्या चेहऱ्यावर विजय स्मित. सगळ्या काकवांचे जीव भांड्यात. पाच मिनिटाचं मौन सुटतं .

परातीत उकड मळण्याचं काम मोठ्या काकूकडे. काही चुकार पीठ तसंच राहिलेलं असतं. जड, पितळी तांब्याने त्यांना दटावावं लागतं. गरम असतानाच हे करायचं नाही तर  एकदा का थंड झालं की त्यात लवचिकता आणता येत नाही. काकू हे काम मस्त करते. घरातल्या मोठ्या मुली उत्सुकतेने बघत असतात. निरीक्षण चालू असतं.

मग आजी किती आकाराचा उकडीचा गोळा घ्यायचा. त्यात किती सारण भरायचं ते ठरवून देते .उकडीच्या गोळ्याला वाटीचा आकार देणे कौशल्याचं काम आहे. बघणाऱ्यांना तर सोपं वाटतं पण करायला गेलं तर कठीण. वाटी न बनता ताटली बनते. कडा फाटतात. पाकळ्या चिकटत नाहीत. जेमतेम पाच नाहीतर सात  पाकळ्यातच मोदक संपतो. असं काहीसं होतं. हे प्रकरण जमलं तर जमलं नाही तर अंत पाहतं. काहीजण वाटी बनवताना तेल तर काहीजण पीठ वापरतात .हळूहळू या सर्वांना एकत्र करायचं आणि त्याचं तोंड बंद करायचं की मोदक झाला तयार.

जिला मोदक जमतात ती  कितीतरी वेळ  स्वतःचीच पाठ  थोपटून घेते. मोदक पातळ कळीदार देखणा झाला पाहिजे. दिसायला पांढराशुभ्र तरी पारदर्शक. आतलं सोनेरी सारण दिसलं पाहिजे. खायला मऊ लुसलुशीत .ही सगळी कमाल असते हस्तकौशल्याची. पुरुष हे काम करू शकत नाहीत कारण यासाठी पाहिजेत नाजूक बोटं.

आता मोदकपात्रात चाळणीवर ठेवायची हळदीची पानं . त्यावर ठेवायचे भरलेले मोदक आणि पंधरा मिनिटे उकडायचे. घरभर आंबेमोहोराचा, गुळ खोबरं वेलचीचा, हळदीच्या पानांचा सुगंध पसरतो. मखरातला गणपती पण काही क्षणासाठी चलबिचल होतो. कधी कधी त्याच दिवशी हरतालिका असते आणि मोदक करणाऱ्या बायकांना फक्त या सुगंधावरच समाधान मानावं लागतं. सगळे मोदक होत आले, आता आरतीला हरकत नाही असा आदेश यायची खोटी, भराभरा आवेशात आरत्या सुरू होतात. प्रकरण हातघाईवर येतं. तयार होणारे मोदक आणि आरती यांची जणू स्पर्धाच. 

नैवेद्य दाखवला जातो, पानं घेतली जातात. पानात गरम गरम वाफाळते , सारणाने गच्च भरलेले मऊ मऊ मोदक वाढले जातात. ते फोडून त्यावर रवाळ सुगंधी तूप. आहाहा, सगळे श्रम सार्थकी लागतात.

देवा तुझ्यामुळे आम्हाला असे मोदक खायला मिळतात. त्यासाठीच तर जगतो आपण. करणारे आणि खाणारे दोघेही तृप्त. आता एका नारळाचे, एक वाटी पिठाचे मोदक चिक्कार होतात. कोणाचं डायटिंग, कोणाचा डायबिटीस, कोणाचं पित्त चाळवतं, कोणाची नावड (यांना चायनीज डपलिंग, मोमो चालतात) त्यामुळे त्यातलेही दोन उरतात. पुढच्या वर्षी विकतचे आणू असं ठरवलं जातं.

माझी या मोदक प्रकरणातून सुटका झाली कारण सासरी सगळ्यांना तळणीचे मोदक चालतात- नव्हे आवडतात. ते एकदमच सोपे.  मी साध्या पोळीच्या कणकेचेच करते. कसे माहित नाही ते दुसऱ्या दिवसापर्यंत खुसखुशीत आवरणाचे राहतात. चिवट होत नाहीत की मऊ पडत नाहीत. पुरी लाटायची डाव्या हाताच्या पाचही बोटांच्या खळग्यात पकडायची, त्यात चमच्याने सारण भरायचं, पाचही बोट जवळ आणायची. झाला मोदक तयार . (धन्य ती सून, धन्य ते सासर .नशीबानेच असं सासर मिळतं)

मोदकाचेही आता प्रकार आलेत. खवा मोदक ,आंबा मोदक, ड्रायफ्रूट मोदक, रवा मोदक, पेढा मोदक, चॉकलेट मोदक,गुलकंद मोदक, इत्यादी. त्यातला सर्वात भन्नाट प्रकार म्हणजे ‘चिंगम’ मोदक .कोणावर सूड उगवायचा असेल तर त्यांच्याकडे हे ‘चिंगम’ मोदक न्यावेत.

मोदक  कसलेही असले तरी मोदकाची चव फक्त गणेशोत्सवातच. पुरणपोळी, खीर, गुलाबजाम,जिलबी जशी कोणत्याही सणाला चालतात, तसं मोदकांचं नाही. कोणी पाडव्याला किंवा होळीला मोदक करणार नाहीत आणि केलेच तरी त्याची चवही लागणार नाही. गणपती आणि मोदक  यांचे काही खास लागेबंधे आहेत हे नक्की.

लेखिका – सुश्री शुभदा पाटकर

संग्राहिका : स्मिता पंडित 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ हीच खरी महालक्ष्मी… लेखक – अनामिक ☆ संग्राहक – श्री सुहास सोहोनी ☆

श्री सुहास सोहोनी

? मनमंजुषेतून ?

☆ हीच खरी महालक्ष्मी… लेखक – अनामिक ☆ संग्राहक – श्री सुहास सोहोनी ☆ 

पण काहीही  म्हणा —

 ज्या ज्या घरात सगळ्या सुना , मुलं , जावा , नातवंडं एकत्र येतात, सर्वजण मिळून कामं करतात,

तिथं खरंच प्रसन्न वाटतं, करमतं ! दोन तीन दिवस अगदी मजेत जातात !

 

मित्र हो ,

हे करमणं , मजा वाटणं , प्रसन्न वाटणं म्हणजेच आपल्याकडे लक्ष्मी आलेली असते !

 

ती येते , रहाते ,जेवते आणि जातांना म्हणते–

‘खुशाल रहा– असंच मिळून मिसळून रहात जा ! ‘ 

 

कुणी आणि का लावलं असेल आपल्यामागे हे सगळं ?

शास्त्रीयदृष्ट्या असेल का काही अर्थ या सणसमारंभांना ?

थोडा विचार केला , चिंतन केलं तर आपल्याला कळेल……….

 

या सणाच्या निमित्ताने आपलं घर भरून जातं–आपुलकीला उधाण येतं–माणसं एकत्र येतात ,भेटतात , बोलतात

आणि पुन्हा आपापल्या गावी पोट भरण्यासाठी निघून जातात ……! 

बैठकीत झालेली माणसांची गर्दी आणि दारासमोर झालेली पादत्राणांची , पावलांची दाटी हीच खरी लक्ष्मी …….!

 

चार दिवस सर्व कुटुंबाचं एका छताखाली येणं – गुण्यागोविंदाने रहाणं – आणि सुखदुःखाच्या गप्पा गोष्टी करणं …… हीच खरी लक्ष्मी !

 

पोरांनी आई म्हणून मारलेली प्रेमळ हाक– दिरानी वहिनींकडे हक्काने मागितलेला कपभर चहा –’ तुम्ही राहू द्या, मी करते ‘ असा एका जावेने दुसऱ्या जावेला केलेला प्रेमळ हट्ट …… हीच खरी लक्ष्मी ….!

 

मित्रहो त्यामुळे पूर्वजांना नाव ठेऊ नका. ते आर्थिकदृष्ट्या गरीब होते– पण मनाने श्रीमंत होते. 

सुशिक्षित नसतीलही– पण नम्र होते. 

एखाद्या वेळेस रागवत असतील– पण डुख धरत नव्हते. 

ते फॉरेन रिटर्न नव्हते– परंतू एखाद्या वादाच्या प्रसंगी नेमकं कुठून आणि कोणी माघार घ्यायची हे त्यांना चांगलं कळत होतं. 

योग्य वेळी योग्य वागणं आणि घर नावाच्या मंदिराच्या भिंतीला तडे न जाऊ देणं …… हीच खरी लक्ष्मी !

 

मला मला करण्यापेक्षा,  तू घे , तू घे चा आग्रह करणे—

आधी काहीतरी खाऊन घ्या आणि नंतर काम करा —अशी  ज्येष्ठांनी केलेली मायेची सूचना —

घर, कुटुंब आणि नातं टिकण्यासाठी प्रत्येक सदस्याने केलेला त्याग —

…हीच खरी महालक्ष्मी ….!

 

लेखक : अनामिक

संग्राहक : सुहास सोहोनी 

रत्नागिरी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मला भावलेला गणेश ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

 ? मनमंजुषेतून ?

☆ मला भावलेला गणेश ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

परवाच संकष्टी झाली. गणपतीची आरती, मंत्रपुष्पांजली आणि नंतर अथर्वशीर्ष म्हणू लागले ” ओम् नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षं तत्वमसि।  त्वमेव सर्वं खल्विदं  ब्रह्मासि—–” असं म्हणून झालं .आणि माझ्या मनात गणेश तत्वाबद्दल विचार सुरू झाले .गणपती, गणेश ,गजानन, विनायक ,गजमुख अशी गणेशाची कितीतरी नावं आहेत. हत्तीचे मुख असलेली ,रत्नजडित किरीट घातलेली, तुंदिलतनू असलेली, उंदीर पायाखाली घेतलेली, अशी सुंदर पार्थिव मूर्ती हीच गणेश का? मला भावलेला गणेश यापेक्षा आणखी कितीतरी वेगळा आहे. प्रत्येक गोष्टीला दोन रुपे असतात .एक डोळ्याला दिसणारं स्थूल रूप किंवा व्यक्तरूप .आणि दुसरं शक्तिमान असलं तरी, डोळ्याला न दिसणारं ते सूक्ष्म किंवा अव्यक्त रूप. भाव हा सूक्ष्म असतो. त्यामुळे मला भावलेल्या गणेशाचे रूप हे सूक्ष्म स्वरूपाचं आहे.

“गण” याचा अर्थ संख्या किंवा मोजणे, मोजमाप करणे वगैरे वगैरे–‘ब्रह्म’ हे अनंत अपरिमित आहे . या ब्रम्हांडातूनच अनेक ब्रम्हांडांचा जन्म झाला. त्यातलंच एक अगदी छोटं आपलं जग . जग हे अंतापासून सांतापर्यंत व अपरिमितापासून परिमितापर्यंत येतं, तेव्हा ते मोजमाप करण्यायोग्य होतं. मोजमाप करणारी शक्ती, गणितज्ञांचा गणितज्ञ तोच गणेश. प्रत्येक गोष्टीला एक मिती असते. जसं की, चिकू , आंबा, फणस, यातील प्रत्येकाचं पान, फूल, फळ, निरनिराळ असतं. आंब्याच्या झाडाला चिक्कू किंवा लिंबू लागत नाही. किंवा गुलाबाला जाई जुई लागत नाही. अशी निसर्गात एक नियमबद्धता आहे. ही नियमबद्धता जेव्हा असंतुलित होते, तेव्हा निसर्गच ती संतुलित करण्याचा प्रयत्न करू लागतो. आणि मग भूकंप, ज्वालामुखी, पूर, आवर्षण अशा गोष्टी घडायला लागतात. निसर्गाची ही नियमबद्धता टिकविणारा नियंत्रक तोच गणेश.

आपले जग हे पृथ्वी, आप ,तेज, वायू ,आकाश अशा पंचमहातत्वांनी बनलेले आहे .ही पाच तत्वे ठराविक प्रमाणात एकमेकात मिसळून त्याचे पंचीकरण झाले. उदाहरणार्थ अर्ध्या आकाश तत्वात उरलेली चारही तत्वे, प्रत्येकी एक अष्टमांश अशी गणना झाली. या गणनेच्या मुळाशी असलेली अधिष्ठात्रि देवता ( त्वं मूलाधार  स्थितोसि   नित्यम् ) ती शक्ती म्हणजेच गणेश.

ही सृष्टी ओंकारातून जन्माला आली. ओंकार हा नाद स्वरूप आहे. गणेशाचे रूपसुद्धा ओंकार प्रधान असल्याचे म्हटले आहे. आणि गणेश हा गणनाकार नाद आहे. म्हणजे या सृष्टीच्या मुळाशी जी सृजन शक्ती आहे ती म्हणजे गौरी नंदन गणेश. प्रत्येक गोष्ट ओमच आहे असे मांडुक्क्य उपनिषदामध्ये सांगितले आहे. आकाशातून पृथ्वीवर पडणारा पाऊस हे जलतत्त्व, आकाशाकडे झेपावणाऱ्या ज्वाला किंवा उष्णता हे अग्नी तत्व, या दोन्हींमधील गाठ, हे पृथ्वीतत्व, तेथून निघणारी रेषा हे वायूतत्व, वरील चंद्रकोरीची दोन्ही टोके मन आणि बुद्धी, आणि त्यावरील टिंब हे चैतन्य. आणि हे सगळं ज्याच्यामध्ये सामावलं आहे हे आकाशतत्व. अशी ही अष्टधा प्रकृती तोच गणेश.

गणेशाचा एक वैज्ञानिक अर्थही मला भावला आहे. पदार्थाचा, वस्तूचा सगळ्यात लहानात लहान घटक म्हणजे अणू. अणूच्या केंद्रकात, प्रोटॉन व  न्यूट्रॉन असतो. व त्यांच्या बाहेरून इलेक्ट्रॉन फिरत असतो. त्याची अष्टक स्थिती प्राप्त करून त्याला स्थिर होण्यासाठी धडपड असते. त्याची गणना करून त्याला स्थिर होण्यासाठी पूरक बनून त्याची आठ आकड्यांपर्यंत गणना करून देतो, ती शक्ती म्हणजेच गणेश. कदाचित अष्टविनायकाची संकल्पना यावरूनही पुढे आलेली असावी.

निर्मिती करणारा ब्रह्मा, सातत्य राखणारा विष्णू ,आणि विलयाला नेणारा तो महेश. या सर्व शक्ती म्हणजेच गणेश.  आपण तरी काय करतो !– पार्थिव गणपती घरी आणतो. आनंदाने, अपूर्वाईने, त्याची पूजा करतो. उत्सव करतो. आणि विसर्जन म्हणजे  जल तत्वात विलय करतो. हेच चक्र निसर्गात चालू आहे. झाडे, पर्वत, समुद्रातील बेटे यांची उत्पत्ती होते, स्थैर्य येते, आणि विलय होतो. आणि परत पुन्हा नवीन जन्म ! आणि या सगळ्यासाठी लागणारी शक्ती तोच गणेश.

‘गुर‘ हा धातू  प्रयत्न करणे, उद्योग करणे हा अर्थ दर्शवितो .गुरंपासून गौरी शब्द बनतो .गौरी म्हणजे सतत उद्यमशील अशी शक्ती. ऊर्जेचे दुसरे नावच गौरी. या ऊर्जेचा उत्सर्ग, अर्थात तिचा मळ म्हणजे गणेश. संस्कृतमध्ये 

‘मळ‘ धातू  हा ‘धारणे‘ या अर्थी वापरतात. ऊर्जेने धारण केलेली, सृष्टी निर्माण करणारी ,गणनाकार, नादमय, ईश्वरी शक्ती म्हणजे गौरी नंदन गणेश.

या विश्वाच्या मागे राहून कार्य करणारी शक्ती म्हणजे, एक फार मोठे रहस्य आहे. गूढ आहे .ते उलगडणेही तितकेच अवघड व कठीण काम आहे. आणि ते काम करणारा ज्ञानमय, विज्ञानमय असा गणेश असतो.

गणेश उत्सव चालू आहे .सर्व शक्तीच्या प्रतीकाची, पार्थिव गणेशाची पूजा करत असताना, निसर्गाचा ऱ्हास न करता ,त्याचे रक्षण करणे हीच भावात्मक पूजा, खऱ्या अर्थाने पूजा होईल. आणि प्रत्येकाला गणेश प्रसन्न होईल.  गणपतीबाप्पा मोरया.

©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

बुधगावकर मळा रस्ता, मिरज.

मो. ९४०३५७०९८७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ दिवस सुगीचे… भाग 3 ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

सौ. सुचित्रा पवार

??

☆ दिवस सुगीचे… भाग 3 ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

(खरीप जोमात असला की शेतकऱ्याच्या पदरात भरभरून माप पडे.) इथून पुढे —

दिवाळी झाली की बैलांना जरा विश्रांती मिळायची. रब्बीसाठी शेत गहू, शाळू, हरभरा, करडा, जवस आदींची जुळवाजुळव व्हायची. बी राखेतच असायचे, कोण उधार उसणवार आणायचे. रब्बीसाठी कुणी कुणी बेवड राखायचे. बेवड म्हणजे शेतीत कोणतेच पीक सहा महिने घ्यायचे नाही. सारखी पिके घेतल्याने जमीन थकते, निकस होते, मरगळते म्हणून तिला विश्रांती द्यायची म्हणजे पुढचे पीक जोमात येते.

दिवाळी झाली की रब्बीच्या पेरणीला सुरुवात व्हायची. संक्रातीला गव्हाच्या ओंब्या टचटच भरायच्या. हरभऱ्याचर घाटे भरायचे. करड्याच्या लालसर पिवळ्या छटेच्या फुलांनी शेते नटत. त्यांचा दरवळ शेतातून घमघमत असे. पावट्याच्या, घेवड्याच्या पाट्यांवर पांढऱ्या फुलांच्या घोसांच्या जागी शेंगांचे भरगच्च तुरे डोलू लागत. शेंगांचा गर्द घनदाट वास शेतातून दरवळत राही. नुसत्या चटणी मिठाच्या देशी चुनुल्या पावट्याच्या कालवणाची चव जिभेवर दिवसभर रेंगाळत राही. घरोघरी पावट्याच्या शेंगा, ओल्या हरभऱ्याचे कालवण असायचे. पोरंठोरं ओल्या हरभऱ्याच्या डहाळ्यांवर तुटून पडत. शेकोटीत हावळा भाजला जाई.

बघता बघता होळी येई आणि पिके पिवळी पडत. गहू हरभरा कापणीला येई. कुणी चांदण्याने, कुणी पहाटे लवकर गहू काढायला जाई. (उन्हाच्या रटात ओंब्याची टोके हातात जोरात घुसतात म्हणून उन्हाच्या आधीच गव्हाचे काड कापले जातात. ) हरभरा उपटून जागोजागी कडवं रचली जात. गव्हाचे काड कापून पेंढ्या बांधल्या जात. शाळूच्या कडप्या ऊन खात पडत.

फाल्गुनाच्या मध्यावर किंवा शेवटी रब्बीचे धान्य घरात येऊन पडे आणि शेतकरी सुस्कारा टाकत, जरा निवांतपणा येई. शेते ओस पडत जत्रा, यात्रा, उरूस यामध्ये शेतकरी हरवून जाई.

सन ९०-९५पर्यंत तर सुगीचे दिवस, शेतातील ती लगबग, पारंपरिक शेती चालू होती. त्यापूर्वी ७२-७३मोठा दुष्काळ पडला होता. तरीही माणुसकीचे मळे मात्र हिरवेगार होते. शेतीला प्रतिष्ठा होती त्यामुळं शेतीवर प्रेम तर होतेच पण निष्ठाही होती. यामुळं लोक शेतीत कसून कष्ट करायचे. पीक कमी जास्त झाले तरी गुरांच्या वैरणीचा तर प्रश्न  मिटत होता. निसर्गाचे चक्र कधी सरळ फिरते, कधी उलटे. निसर्ग कधी कृपा करतो, कधी अवकृपा. प्रचंड प्रमाणातील वृक्षतोडीने हळू हळू पाऊस ओढ देऊ लागला. शेतीची प्रतिष्ठा, निष्ठा कमी झाली. निसर्गातील बारकावे, निरीक्षण, अनुभव सगळं मागं पडलं. शिकलेल्या मुला-मुलींना स्वतःच्या शेतात काम करायला लाज वाटू लागली. जनावरांना चारा पाणी करण्याची लाज वाटू लागली. लोकांच्या गरजा वाढल्या, शेतीचे स्वरूप बदलले. नगदी पिके घेण्याकडे कल वाढला. कडधान्यावर कीड पडू लागली शेतकऱ्यांनी देशी वाण मोडले. बेभरवशाची शेती झाली. न परवडणारी मजुरी आणि मजुरांची कमतरता यामुळं शेतीचे यांत्रिकीकरण झाले. गुरे कमी झाली. नांगर गेले, बैलगाड्या मोडल्या. ट्रॅक्टर आले, गावाशेजारील जमिनी भरारा प्लॉट पाडून विकल्या गेल्या. कीटकनाशकांचा वापर वाढला. त्यामुळं जैवसाखळीतील विशिष्ट प्रकारची झुडपे, गवत, भाज्या लुप्त झाल्या पर्यायाने त्या त्या झाडाझुडपावरील, गवतावर पोसणारी, अंडी घालणारी शेतीसाठी उपयुक्त कीटकांची, फुलपाखरांची मांदियाळी नामशेष झाली.

निसर्ग बिघडायला दुसरं तिसरं कोणी कारणीभूत नसून आपणच आहोत. निसर्गाच्या विरुद्ध आपण वागू लागलो, प्लास्टिकचा अति वापर, बेसुमार लोकसंख्या, बदलती भोग विलासी चैनवृत्ती निसर्गाचा ऱ्हास करत आहे इतका की त्याचे अस्तित्वच धोक्यात आलेय. जास्त उत्पन्न देणारे हायब्रीड आले आणि गुरांना आवडणारा आणि सकस असणारा देशी जोंधळ्याचा वाण संपुष्टात आला. क्वचित क्वचित भागातच आता मोत्यासारखा देशी जोंधळा पिकतो अन्यथा हायब्रीड आणि शाळूच पिकवण्याकडे त्या त्या भागातील लोकांचा कल वाढला. पारंपरिक शेती संपल्याने विकतची वैरण आणून जनावरे पाळणे परवडेना. त्यामुळं धष्ट- पुष्ट जनावरांचे गोठे मोडले. घरातले दूध-दुभते, दही, ताक, लोणी, चीक असलं अस्सल नैसर्गिक सकस पदार्थ शेतकऱ्याच्या ताटातून  हद्दपार झाले आणि खाऊन पिऊन समृद्ध असणारी पिढी सम्पली. याचबरोबर शेजारधर्म, आपुलकी परोपकार, एकमेकांच्या शेतात हुरडा खायला जाणे, एकमेकांच्या शेतातले पसामूठ आपापसांत घेणे देणे बंद झाले. मिळून मिसळून कामे करणे, मिळून मिसळून रानात नेलेल्या फडक्यावरील भाजीभाकरी एकत्र खाणे शेतीचे अनुभव, ज्ञान परस्परात वाटणे, ऐकणे, अनुकरण करणे संपले.

शेतातल्या सुगीबरोबरच मानवतेच्या सुगीचाही आताशा दुष्काळ पडू लागला आहे, कदाचित पृथ्वीवरील माणसाचे पिकच कधीतरी नष्ट होईल आणि निसर्गाचे चक्र मात्र पुन्हा नव्याने जन्म घेईल. . . . .

— समाप्त — 

© सौ.सुचित्रा पवार 

तासगाव, सांगली

8055690240

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ दिवस सुगीचे… भाग 2 ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

सौ. सुचित्रा पवार

??

☆ दिवस सुगीचे… भाग 2 ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

(अकितीला अंगणात लावलेल्या पडवळ, दोडका, भोपळा, काटे वाळकं वेलीवर लोम्बकळत, बांधावरच्या गोल भोपळ्याच्या वेलीवर पिवळसर केशरी फुलांचा बहर यायचा.) इथून पुढे —-

आषाढाच्या भुरभुरीने पिकं गुढघ्याइतकी झालेली असत. श्रावणातील ऊन पावसाच्या खेळात पिकांना चांगलाच बहर यायचा. कुणाची कडधान्य फुलकळीला यायची तर काही कडधान्यांच्या फुलातून मूग, चवळी, श्रावण घेवडा, उडदाच्या कोवळ्या कोवळ्या शेंगांचे घोस लटकत. वेगवेगळ्या रंगांचे कीटक, भुंगे गुंजारव करत पिकांवर बसायची. रंगीबेरंगी फुलपाखरे इकडून तिकडे भिरभिरायची. काळ्या, शंखाच्या गोगलगायी चमचमीत वाटा सोडत इकडून तिकडे फिरत. पक्ष्यांचे आनंदी किलबिलाट रानोमाळ घुमत असत.

शेतातून आलेल्या बायका रात्री फेर धरून पंचमीची गाणी गात-

सासुरवासाच्या कथा सांगणारी आणि माहेरच्या आठवणी जागवणारी. ठिकठिकाणी झाडाला झोपाळे झुलायचे. शेताच्या कामातून थोडी सवड मिळालेली असायची. हिरव्याकंच कचगड्याच्या काकणाचे हातभर चुडे लेऊन बायका झोपाळ्यावर हिंदोळत रहायच्या. पंचमीची गाणी शिवारभर पिकांवर लहरत रहायची…

भादव्याला पावसाची उघडीप मिळाली असली तरी ढगांचे पुंजके आकाशातून वस्ती करायचेच. अंगणात गौरीच्या रोपांना लाल, पांढरी, गुलाबी फुले यायची. त्यावर रंगीबेरंगी फुलपाखरांच्या झुंडीच्या झुंडी भिरभिरत रहायच्या.

ऊन चांगलंच भाजून काढायचं. पिकात शिरलं की गदमदुन जायचं. मूग, उडीद, अळसुंद(चवळीसारखेच पण तोंड काळे असते. देशी चवळी पूर्ण लाल असते किंवा पूर्ण पांढरी तोंड लाल)काळे श्रावण, कुशीचे हुलग्याच्या शेंगा वेलीवर तटतटू लागायच्या. बायका कम्बरेला वट्या बांधून वाळल्या शेंगा तोडू लागायच्या. जोंधळा कम्बरेला लागायचा. घरोघरी ओल्या मूग, अळसुंद, काळ्या श्रावणाची आमटी उसळ असायची. तोडून आणलेल्या शेंगा उन्हात वाळत पडायच्या, त्यांचा तटतट आवाज होऊन बी खाली पडायचे, टरफल मुरगळुन बाजूला व्हायची. उन्हाच्या रटाने लाल, पांढऱ्या अळ्या बाहेर पडू लागायच्या, चिमण्या त्यावर टपलेल्या असायच्या. जवळच्या बांबूच्या आड्यातल्या, कौलारू घराच्या वळचणीतून भुरदिशी चिमण्या यायच्या आणि बाहेर पडलेल्या अळ्या गट्टम करायच्या.

शेंगा चांगल्या वाळल्या की बडवून वाऱ्याला लावून स्वच्छ झाडून पाखडून किडके, मरके कडधान्य काढून स्वच्छ कडधान्ये पुन्हा कडकडीत ऊन खाऊन गरजेपुरती डब्यात बसायची, पुढील वर्ष्याच्या बियासाठी गाडग्या मडक्यातल्या, कणगीतल्या राखेत विसवायची आणि गरजेपेक्षा जास्त असतील तर बाजारात चार पैसे मिळवून द्यायची, तेलामीठाला हातभार.

कडधान्ये विसाव्याला ठेवेपर्यंत अश्विन येऊन टपकायचा. अंगणातल्या उंच उंच झेंडूच्या शेंड्याला फांदीच्या टोकातून इवल्या इवल्या कळ्या डोकवायच्या.

तुरीला फुलं-कळ्या यायला सुरुवात व्हायची. माळाच्या मटकीला कुठं फुलं कुठं शेंगा लागायच्या. जोंधळा पोटरीला आलेला असायचा, कधी निसवत असायचा. निसवलेल्या कणसावर इवली इवली फुले दिसायची. असंख्य मधमाशा कीटक इकडून तिकडे कणसावर भिरभिरत रहायचे. खाली पडलेल्या फुलांवर मुंग्या तुटून पडायच्या. भुईमूगाला पिवळी पिवळी फुले लागत. बहराला आलेली पिके वाऱ्यावर डोलायची. पिकातल्या वाऱ्याचा एक अनामिक नाद सगळ्या शिवारभर घुमत रहायचा. वाऱ्याच्या साथीने डुलणारे शेत पाहून शेतकरी मनही आनंदाने फुलून यायचे.

ढगांच्या प्रचंड गडगडाटात  हत्तीचा पाऊस हजेरी लावून गेलेला असे. निवळसंख ओढे, ओघळी खळखळ वाहत असत. शेते जीव्हळून पांदीतून पाणी वहात असे. शेतातली कारळाची पिवळीधम्मक फुले वाऱ्यावर डुलत असत. सूर्यफूले एकेका पाकळीने उमलू लागत. उमललेली पिवळीजर्द फुले शेताला शोभा आणत. भुंगे, मधमाश्या फुलांना मिठी मारून बसत. जुंधळा हुरड्याला येई. ठिकठिकाणी शेकोटी पेटवून हुरडा भाजला जाई. टपोरी कणसे खुडून आगीवर खरपूस भाजून सुपात चोळून पाखडून त्यावर चटणी मीठ टाकून चविष्ट हुरडा शेतकऱ्याच्या घरात हमखास असे. मक्याची कणसात दूध भरलेलेअसे. उकडून, भाजून, सोलून, गरम फुपुट्यात खरपूस वाफवलेली कणसे पोटभर खायला मिळत. भूमीपूजनाला धपाटी, कढी, वडी, कडाकणी, बाजरीचं उंड, भेंडी, दही भाताचा नैवेद्य शेताला दाखवला जाई आणि काढणीला आलेली पिकं काढायची धांदल सुरू होई.

सरत्या अश्विनात आणि निघत्या कार्तिकात डासं वारं भिरभिरत असे. आकाश निरभ्र झालेले असे. डास्या वाऱ्याने त्वचा तटतटू लागायची. थंडीची चाहूल लागायची. भुईमुगाची पाने काळपट तपकिरी रंगावर यायची. उंच उंच जोंधळ्याच्या डोलत्या पिकांवर पाखरांचे थवे भिरभिरायचे. मचाणी बांधल्या जायच्या, गोफणी तयार व्हायच्या. म्हातारे कोतारे, तरणे शेतावर वस्ती करत, कुणी पहाटेच उठून पाखरं राखायला जायचे. शेताशिवारातून हाकाट्यांचे आवाज, रिकाम्या डबड्यांचे आवाज घुमू लागत.

पावसाने उकणून गेलेल्या खळ्यांची डागडुजी होई.

कार्तिकच्या मध्यावर किंवा शेवटी गाव ओस पडत. खुडणी कापणीला जोर येई. कणसं खुडायची, जोंधळा पाडायची एकच धांदल उडायची. धारदार विळे बोट कापत तर कधी पायात सड घुसत. आसपासच्या औषधी पाल्याला चुरून रस काढून जखमेवर लावून चिंधकाची दशी काढून पट्टी बांधली जाई. शेंगा काढणीला नांगराची तजवीज आणि तोडणीला बायका, पोरांना शेंगाच्या रोजावर बोलवायची धांदल उडे. शेंगांचा सॉड (उतार)बघून एकूण गोळ्यांची संख्या ठरे. जितका उतार जास्त तितकी गोळ्यांची संख्या जास्त. १४, १८, २० अश्या संख्येत गोळे ठरायचे. दिवसभर रोजगाऱ्याने तोडलेल्या शेंगांचे समसमान गोळे करून त्यातला १ गोळा म्हणजेच पाटी, अर्धी पाटी किंवा दीड पाटी शेंगा दिवसभर शेंगा तोडणाऱ्यास मिळत. दिवसभर नांगरलेल्या शेतातले वेल वेचणे, ढीग घालणे मग शेंगा तोडायच्या. माणसांच्या आवाजाने राने गजबजून जात.

मागतकरी झोळ्या घेऊन रानातून हिंडत. कुणाच्या शेतातून शेंगा, कुणाच्यातून कणसे मागत हिंडत. बऱ्याचदा कणसांची चोरी व्हायची, कधी तोडून ठेवलेल्या शेंगांचीही चोरी व्हायची.

पांढऱ्याखड शेंगा पोतीच्या पोती भरून गाडीतून घरला येत. खळ्यात मोत्यासारख्या धान्याची रास पडे. धान्याच्या पोत्यांच्या थप्पी जोत्यावर येऊन पडत. जेवढी थप्पी मोठी तितकी शेतकऱ्यांची छाती अभिमानाने फुलून येई. सहा-सात महिने रात्रंदिन गाळलेल्या घामाचे चीज होई आणि उरलेल्या कामाची लगबग होई.

जोंधळ्याच्या पेंड्यांची बुचाडे लागत, शेंगांचे भुस्काट निवाऱ्याला बसे. तुरीच्या शेंगा गडद तपकिरी होत. पाला पाचोळा वेचून जनावरांपुढे पडे.

तूर मटकी काढून झाली की खरिपाचा हंगाम संपे पण माणसांच्या आणि गुरांच्या वर्षभराच्या पोटा पाण्याची सोय होई. खरीप जोमात असला की शेतकऱ्याच्या पदरात भरभरून माप पडे.

क्रमशः …

© सौ.सुचित्रा पवार 

तासगाव, सांगली

8055690240

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ज्येष्ठा कनिष्ठा गौरी ☆  श्री दिनेश डोंगरे ☆

??

ज्येष्ठा कनिष्ठा गौरी ☆  श्री दिनेश डोंगरे ☆

“स्वच्छता ज्याचे घरी, लक्ष्मी तेथे वास करी “ असे सार्थपणे म्हटले जाते. 

स्वच्छता – अस्वच्छता

भाव – अभाव

धर्म – अधर्म

उल्हास – आळस

उपद्रवी – अनुपद्रवी

सुसंवाद – वाद विवाद

प्रिय – अप्रिय

चांगले – वाईट

इष्ट – अनिष्ट

या सर्व परस्पर विरोधी बाजू किंवा एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात.

तद्वतच “अलक्ष्मी – लक्ष्मी ” या सुद्धा परस्पर विरोधी.  परंतू  ज्येष्ठा – कनिष्ठा अशा बहिणी आहेत.

दोन्हीही बहिणींची समुद्रमंथनातून अवतीर्णता झालेली आहे.

लक्ष्मीस जो मान देवता म्हणून मिळाला, तो मान ज्येष्ठ असूनही आपणास नाही, अशी खंत अलक्ष्मीस होती व त्याचे निराकरण करण्याच्या हेतूने श्रीविष्णू यांनी वरदान देत, अलक्ष्मीचे पूजन लक्ष्मीबरोबर वर्षातून एकदा होईल, असे नियोजन करविले. त्यानुसार पार्थीव श्रीगणेश पूजन कार्यकाळात येणार्‍या अनुराधा नक्षत्रावर “अलक्ष्मी-लक्ष्मीचे” अवाहन करणेचे, तद्नंतर दुसरे दिवशी येणार्‍या जेष्ठा नक्षत्रावर “अलक्ष्मी व लक्ष्मीचे” पूजन, नैवेद्य अर्पण करणेचे व तिसर्‍या दिवशी मूळ नक्षत्रावर विसर्जन करणेचे, असा अनुक्रम नियोजित केला गेला. त्याअन्वये “जेष्ठ” बहीण असलेल्या “अलक्ष्मी” व कनिष्ठ बहीण “लक्ष्मी” असे  दोघींचेच पूजन करताना ” जेष्ठाकनिष्ठागौरी ” असे नामकरण केले जाऊ लागले.

इथे ” गौरी ” या शब्दाचा अर्थ ‘ निष्पक्षतेच्या देवता ‘ असा घ्यावा.

“अलक्ष्मी-लक्ष्मी “ या दोन्ही बाजूंसोबतचे  पूजन म्हणजे ‘ निष्पक्षता ‘ जाणावी.

या अनुसार, चांगली व वाईट बाजूसह, अनिष्ट गोष्टींबद्दलसुध्दा मनात पूज्यभाव बाळगणे, हे मानवाच्या आध्यात्मिक उन्नतीचे द्योतक असल्याचे दिसते.

व्यावहारिक भाषेत ” अलक्ष्मी ” म्हणजे व्यय (खर्च), आणि “लक्ष्मी “ म्हणजे आय (आवक)ज्येष्ठा व मूळ नक्षत्र ही भयानक नक्षत्र आहेत, आणि यातूनच ” मुळावरच आला ” असे उच्चारण वापरले जाऊ लागले.

अलक्ष्मीचे पूजन होणे, हे  तिच्यासाठी सुखावह असते, व वर्षभरासाठी विमा काढल्यासारखे पूजन करणार्‍याच्या (व्यय ) खर्चावर नियंत्रण मिळवले जाते. त्यात आपल्याकडे लक्ष्मी स्थिर राहण्याचे संकेत मिळतात, हे जाणावे.

त्यासाठी मनोभावे वार्षिक नियोजनाप्रमाणे ” अलक्ष्मी-लक्ष्मी “—ज्येष्ठा-कनिष्ठा गौरी पूजन अंगीकारावे.

दिपावलीत  लक्ष्मीपूजनावेळी वेगळ्या स्थानी केरसुणीचे म्हणजेच झाडूचेही  पूजन केले जाते, कारण झाडू हे “अलक्ष्मीचे” आयुध म्हणजे अस्त्र आहे. तिचा कोप म्हणजे आपल्याकडील संपन्नतेवर झाडू फिरवला जाणे. यासाठी तिचे त्यावेळीही पूजन केले जाते.

जेष्ठा कनिष्ठा गौरी पूजनासाठी उभ्या सजवलेल्या स्थितीत असणाऱ्या दोन जणी म्हणजे या  “अलक्ष्मी आणि लक्ष्मी “. 

त्या तीनही दिवसात या दोघींचेही विनम्र नमन असावे.

खड्या स्वरुपात असणार्‍या “अलक्ष्मी-लक्ष्मी ” —

या पद्धतीच्या पूजेसाठी दोन खडे जलवाहत्या नदीतून आणावेत. कारण या जलदेवता आहेत.

पाच किंवा सात खडे आणणे म्हणजे अलक्ष्मी, लक्ष्मीसह गंगा, यमुना, सरस्वती, सिंधू, कावेरी अश्या पवित्र जलदेवता आणल्या, असे मानून पूजन व्हावे, जेणेकरुन पाण्यासारखा वाहता पैसा येत राहील व अलक्ष्मीच्या  प्रसन्नतेने आपल्या खर्चावरही अंकूश राहील. आपल्याला वाहता पैसा यावा असे वाटते, पण खर्च मात्र वाहता नसावा असेही वाटते, त्याकरिता “अलक्ष्मी-लक्ष्मी ” दोघींचे एकत्रित पूजन श्रीविष्णूंनी अग्रेषीत केले आहे असे मनोमन जाणावे.

अलक्ष्मी असण्याचे लक्षण म्हणजे – अघोरी वृत्ती, अस्वच्छता, उपद्रवी अवगुण, कलह, अमिषप्रियवर्तन, आळस हे आहे व ते टाळणेच इष्ट जाणावे.

त्यामुळेच कुठेही स्थिर न असणार्‍या लक्ष्मीचे चिरकाल स्थैर्य अवागमनासह राहणेचे होते.

गरजूंना मदत करीत लक्ष्मीला फिरते ठेवणे केंव्हाही फलदायी असते. लक्ष्मी कोंडून ठेवल्यास अयोग्यतेचे  जाणावे.

श्रीगजानन महाराज यांनी त्यांच्या समक्ष

“अर्पण निधी साठवू नये” 

“अस्वच्छता नसावी” आणि “यात्रा थांबवू नये”—असे ब्रीद संस्थान शेगांवसाठी अधोरेखीत केलेले आहे, हे वास्तव.

त्यानुसार आजही वर्षभराचा खर्च कितीही असला, तरी येणार्‍या अर्पणनिधीचा वापर सातत्याने नवनव्या संधीतून केला जातो, पण बँक डिपॉझिट करुन लक्ष्मी साठवण्याचे होत नाही.

या श्रीगजानन महाराजांच्या कृपादृष्टीने आजही संस्थान श्रीक्षेत्र शेगांव उत्तरोत्तर फलद्रूप होत आहे.  सुखासमाधानाने

 ” सेवाकार्य यज्ञ ” अखंड चालू आहे, हे आपण पहात आहोतच.

या लेखातून केलेली व्यक्तता न भावल्यास दुर्लक्षित करणेचे असावे ही विनंती व क्षमस्व. 

आशय भावल्यांस निश्चीतच अनुकरण व्हावे, ही माझी सदिच्छा व सर्वांना अनुकरणासाठी शुभेच्छा!

 

।। नमो जेष्ठाय च कनिष्ठाय च  स्तेतानाम् पतये नमः ।।

अर्थात –

” ज्येष्ठा कनिष्ठासह उपद्रवी अवगुणांनीही नमन “

।। ॐ नमो श्रीगजानन ।।

© श्री दिनेश डोंगरे

बीड

मो ९८६०९४२२५०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ दिवस सुगीचे… भाग 1 ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

सौ. सुचित्रा पवार

??

☆ दिवस सुगीचे… भाग 1 ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

 दिवस सुगीचे सुरू जाहले –

ओला चारा बैल माजले—

अशी एक सुगीचे यथार्थ चित्रण करणारी फार सुंदर कविता आम्हाला तिसरी-चौथीत होती. शेतकऱ्यांसाठी सुगी म्हणजे धामधुमीचा काळ. त्यातल्या त्यात खरीप अर्थात दिवाळीपूर्वीचा हंगाम म्हणजे वेगवेगळ्या पिकांची काढणी,कापणी, मळणी आणि धान्य घरात आणेपर्यंतचा सर्व कालावधी हा अतिशय व्यस्त,धामधुमीचा आणि आनंदाचा असतो.आतापर्यंत केलेल्या वेळेचे, पिकाचे नियोजन, आणि शेतात केलेल्या कष्टांचे चीज सुगीत होणार असते. आणि वर्षभर शेतकऱ्यांचे कुटुंब, गुरा-ढोरांच्या पोटापाण्याची बेगमी, या सुगीवरच अवलंबून असते. पीक कसे आले?यावरही सुगीचे फलित अवलंबून असते. सुगीच्या दिवसात शेतकरी कुटुंबाला वेळकाढूपणा करून, टंगळमंगळ करून चालत नाही, की एखाद्या गावाला शिवालाही जाऊन चालत नसते. घरादाराला कुलूप घालून सर्वांची रवानगी शेतात करावी लागते. कधी कधी तर शेतावरच मुक्काम ठोकायला लागतो. त्यावेळी सर्वत्र कसे एकदम धावपळीचे चित्र असायचे.

खरे तर वैशाख सुरू झाला कीच बी बेवळा जमवण्याची तयारी सुरू व्हायची. मान्सूनचे वारे वाहू लागत आणि हवेतील उष्मा थोडासा कमी होई. भुईमुगाच्या शेंगा फोडायला सुरुवात व्हायची, कारण हे बी तयार करून ठेवायला लागायचे. बाकी कडधान्ये राखेत असत, ती पटकन चाळून घेता येत. पण शेंगदाण्याचे तसे नसते. घरच्याच पोत्यातील देशी शेंगांचे बी काढावे लागे. घरोघरी आयाबाया,पोरं- ठोरं शेंगा फोडायला सुरू करायची. हे कामसुद्धा रोजगाराने असायचे. चार-आठ आण्याला मापटाभर शेंगदाणे फोडून द्यायचे. सर्व शेंगा फोडून झाल्यावर मग मापट्याच्या हिशोबाने पैसे आणि थोडेसे शेंगांचे घाटे रोजगाऱ्यास मिळत. शेंगा फोडून झाल्या की बी अर्थात शेंगदाणे निवडण्याचे काम करावे लागे. फुटके,डाळी झालेले,बारीक बारीक शेंगदाणे वेचून, मोठे टपोरे शेंगदाणे पेरणीसाठी बाजूला काढावे लागत.आकाशात इकडे तिकडे पळणारे काळे काळे ढग आता स्थिरावू लागत. थंड हवा वाहू लागे आणि बियांचे आतून रुजणे सुरू होई.

उकाड्याने हैराण झालेल्या जीवास अचानकच आलेला एखादा पावसाचा शिडकावा दिलासा देई.वेगवेगळ्या पक्ष्यांचे वेगवेगळे आवाज आसमंतात भरून जात. कोकीळ आणि पावशाचे प्रियाराधन तार स्वरात सुरू व्हायचे आणि शेतातील राहिलेला काडी कचरा वेचून ढेकळं फोडून जमीन एकसारखी करायला सुरुवात व्हायची. मृग नक्षत्र सुरू होताच इथं तिथं मिरगी किडे दिसत. बायका त्यांना हळदकुंकू लावून पूजत. पावसाची वर्दी देत गार गार वारे वाहू लागत आणि पाठोपाठ टपोऱ्या थेंबासह जलधारा कोसळू लागत.

घन घन माला नभी दाटल्या । कोसळती धारा ।।

असेच काहीसे वातावरण असायचे. मातीचा सुगंध चहूबाजूस दरवळू लागायचा. तप्त धरणी पाऊस पिऊन तृप्त व्हायची.

इकडं आमच्या शाळा सुरू व्हायच्या. पावसात भिजत भिजत शाळेला जायला नको वाटायचे. उलट कांबळी पांघरून घरातूनच पाऊस पहावा वाटायचा. कौलांच्या वळचणीच्या पाऊसधारा झेलाव्या वाटायच्या. शेतातल्या मऊ मातीत पाय रुतवू वाटायचे.सर्वांबरोबर शेतात जाऊन शेतातली कामे करावी वाटायची. चुलीपुढील ऊबीत बसावे वाटायचे. तरीही शाळेला जावे लागायचेच. कुणाची तरी जुनी पुस्तके अर्ध्या किंमतीने घ्यायची. वह्या लगेच मिळत नसत आणि तसेही प्राथमिक शाळेत पाटीचा वापर जास्त होत होता, वही एखादं दुसरीच.

राखेतला बी बेवळा चाळून काढायची धांदल उडायची. आठवणीने कुरी सांदीकोपऱ्यातून बाहेर येऊन सुताराकडे दुरुस्तीला किंवा सांधायला येऊन पडत. देशी चवळी, मूग, उडीद, मटकी, काळा श्रावण, कुशीचा हुलगा, तूर, ज्वारी राखेतून काढून चाळले जायचे. देशी पावट्याचे बी, सूर्यफुलाचे, कारळ मुरडान घालायला सोबत असायचे. पसाभर हावऱ्या (पांढरे तीळ) गठूळ्याच्या एका टोकाला आठवणीने बांधल्या जायच्या. पेरणी झाली की असेच विस्कटून द्यायच्या. अडशिरी पायलीभर हावऱ्या आरामात निघायच्या.

दहीभात,नारळ पेरणीच्या श्रीगणेशाला आणि धरणीच्या शांतीसाठी. घात अर्थात वाफस्याची वाट प्रत्येकजण पहात असायचा. ओल किती खोल गेलीय याची चाचपणी व्हायची अन पेरणीची एकच धांदल उडायची. बैलगाडीत कुरी,बी बेवळा टाकून घरदार पेरणीला निघायचं. गावात सकाळी सकाळीच सामसूम व्हायची. पेरणी झाली आणि लगेच पाऊस आला की आनंदाला उधाण यायचं, कारण बी व्यवस्थित मुजून रुजणार याची पक्की खात्री व्हायची.

वैशाख-जेष्ठ महिना अशा प्रकारे सुगीच्या तयारीच्या धामधुमीतच न पेरणीतच संपून जायचा.

आषाढाचे काळे काळे कुट्ट पाण्याने ओथंबलेले ढग आकाशात गर्दी करायचे अन भुर भुर पाऊस सतत चालू रहायचा. सोबत बोचरा भिरभिर वारा. बाया माणसं पोत्याची खोळ घेऊन शेताला जायचे. गुराखी पोत्याची खोळ,काठी घेऊन गुरे चारायला निघायची. सततच्या भुरभुरीने सगळीकडे हिरवे पोपटी गवताचे कोंब जिकडे तिकडे उगवत. माळराने, टेकड्या, डोंगर हिरवाई पांघरून बसत. जनावरांना ती हिरवाई भुरळ पाडायची आणि ती हावऱ्यागत इथं तिथं मनसोक्त चरत रहायची. उन्हाळ्यात कडबा खाऊन भकाळलेलं पोट आता चांगलंच टूमटूमित व्हायचं.शेतात वित दोन वित पीक वाऱ्यावर डोलायचं. पिकाबरोबरच तणही गर्दी करायचं, इतकं की पीक मुजुन जायचं. दिवस दिवस खोळ पांघरून बायका खुरप्याच्या शेंड्याने शेंड्याने अलवार पिकाच्या मोडाला धक्का न लावता तण वेचत रहायच्या. कधी अभंग, कधी सुखदुःखाच्या गोष्टी तर कधी पिकाचा अदमास बांधत शिवारे पोत्याच्या खोळीत आणि बांगड्यांच्या किणकिणीत गजबजून जायची. सततच्या रिपरिपीने सगळीकडे चिखल चिखल व्हायचा.

मूळ नक्षत्राच्या खिचड्याला बायकांची धांदल सुरू व्हायची. उखळीत जुंधळ कांडून चुलीवर रटरटत असायचे. करडं भिजवून उखळात चेचून त्यातून दूध काढलं जायचं. ओढ्या ओघळीच्या खळखळ पाण्यावर जनावरांना मोकळं सोडलं जायचं. गळ्याइतक्या पाण्यात म्हशी, रेडकं मनसोक्त डुंबत राहायची. मालक गोड शीळ घालत चिखलाने बरबटलेली अंगे दगडाने घासून घासून स्वच्छ करायचा. बैलांना ओंजळीनं पाणी मारत मारत मायेने हात फिरवत कांती तुकतुकीत करायचा. ओल्या गवताने तृप्त झालेली जनावरे धुतल्यावर अजूनच तजेलदार दिसायची आणि ही नवी कांती बघून शेतकरी प्रसन्न व्हायचा. खिचडा,आंबील खाऊन जनावरे सुस्त होत.

पुरणपोळीचा घास सगळ्या जनावरांना मिळायचा. नवे कासरे, शिंगांचे गोंडे आणि आरशाच्या रंगीबेरंगी झुली पाठीवर लेऊन लेझीम,वाजंत्र्याच्या गजरात सजलेले बैल मिरवणुकीत सामील व्हायचे. ( या दोन दिवसात किती पण अडचण, नड-अड असली तरीही शेतकरी बैल औताला अथवा बैलगाडीला जोडायचे नाहीत.) आंब्याच्या पानांची तोरणे मातंग समाजातील लोक गोठ्याला, घराला आणून बांधत. गावभर मिरवून दृष्ट काढून बैल गोठ्यात विश्रांती घेत. अकितीला अंगणात लावलेल्या पडवळ, दोडका, भोपळा,काटे वाळकं वेलीवर लोंबकळत. बांधावरच्या गोल भोपळ्याच्या वेलीवर पिवळसर केशरी फुलांचा बहर यायचा.

क्रमशः …

© सौ.सुचित्रा पवार 

तासगाव, सांगली

8055690240

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ फसवणूक…. ??? ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ फसवणूक…. ??? ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

एक आजी ….वय वर्षे असावे कदाचित 90 वर्षे…. 

कुत्री मांजरं …. जनावरं असली तरी एकमेकांना ती चाटतात प्रेमाने…. पण काही घरांमध्ये म्हाताऱ्या….  आजारी…. आपल्या लोकांचा हात हातात घेणे “Below Dignity” समजतात….

खुरटलेलं झाड असेल तरी ते आपल्या निष्प्राण फांदीला धरून ठेवतं मरेपर्यंत…. 

डुक्कर गटारात लोळतं असेलही…. परंतु आपल्या कुटुंबाला सोबत घेऊन रस्त्याने दिमाखात फिरत असतं… त्याला जणू हेच दाखवायचं असतं डुक्कर असलो, तरी आम्ही आई बापाला सांभाळतो ! 

जनावरं जिथं आपल्या आई बापाला सांभाळून प्रेम करतात….  तिथं माणसाचा जन्म मिळालेली काही मंडळी आपल्या आई बापाला विसरून जातात….

अशीच ही एका सुखवस्तू घरातली आजी…. 

पायताण जुनं किंवा खराब झालं तर फेकून देतात….  तिच्यापासून आपल्याला काहीच फायदा नसतो….

अशीच मुलाबाळांनी फायदा असेपर्यंत वापरून…. जीर्ण झालेली एक आजी उकिरड्यावर फेकून दिली…. पायताण समजून….! 

रस्त्यावर ही आजी मला भेटली तेव्हा म्हणाली, “ मला काहीच दिसत नाही रे बाबा….”

तिच्या डोळ्यावर चष्मा होता…. मी तो चष्मा हातात घेऊन  नीट पाहिला, त्याला दोन्ही काचा नव्हत्या….  

ती फक्त फ्रेम घालत होती…. 

मी तिला म्हणालो, “ म्हातारे चष्म्याला काचच नाही, दिसंल कसं तुला ? “

ती हसत म्हणाली, ‘आस्सा होय मला वाटलं… माझे डोळे कामातनं  गेलेत … आत्ता कळलं माझे डोळे चांगले आहेत….चष्मा खराब झालाय… “ 

वाईटातून ही चांगलं शोधणारी ही आजी…. 

मी म्हणालो, “ चल डोळे तपासून चष्मा करून देतो…”

ती म्हणाली,  “नको …. चष्मा दिलास तरी आता कोणाला बघू बाबा  …? “

तरीही हट्टाने मी तिला मोटरसायकलवर बसवलं…. मोटर सायकल वर लहान मुलीला “पप्पा” जसा कमरेभोवती विळखा घालून बसायला सांगतो,  त्याप्रमाणे मी तिला माझ्या कमरेला विळखा घालून मोटर सायकलवर बसायला सांगितलं…. फार मोठ्या मुश्किलीने ती बसली…. 

डोळे तपासून आलो…. चष्मा करायला टाकला….!

चष्मा तयार झाल्यानंतर मी तो तिच्या डोळ्यावर अडकवला….  

चष्मा घालून तिने इकडे तिकडे टकामका पाहिलं…. 

तिला दिसायला लागलं होतं….  ती हरखली…. 

तिने बोचकयातून एक पिशवी काढली…. त्या पिशवीतून तिने बरीचशी चिल्लर काढली…. 

मला तिने पैसे मोजायला सांगितले. मी सगळी चिल्लर मोजली. एकूण रुपये 192 होते…. 

मला काही कळेना…. मी शून्य नजरेने तिच्याकडे पहात विचारलं….. “ हे काय ? “

ती म्हणाली,  “ मागल्या महिन्यात नातवाचा वाढदिवस होता,  त्याला काहीतरी घ्यायचं म्हणून पैसे साठवत होते… किती पैसे साठले ते मला माहित नाही…. तू मोज… आता नातू तर येणार नाही….  पण हे सगळे पैसे तू घे..”

मी म्हणालो,  “अगं आज ना उद्या येईल ना नातू तुझा… मला नको देऊस हे पैसे…! “

डोळ्याला पदर लावून ती म्हणाली, “ हो मी पण हाच विचार करते आहे गेल्या दहा वर्षापासून ….. येईल माझा नातू कधीतरी…. जो दहा वर्ष आला नाही तो आता इथून पुढे काय येणार ?”– ती डोळ्याला पदर लावून रडत म्हणाली….

“आता तूच माझा पोरगा आणि नातू आहेस आता हे सगळे पैसे तू घेऊन जा….” 

हे पैसे ती गेले चार महिने साठवीत होती…. नातू येईल या आशेवर….. पण….. नातू आलाच नाही…

यानंतर मी माझ्याकडच्या पाचशेच्या दोन नोटा काढल्या आणि आजीच्या हातावर टेकवत म्हणालो, “ आयला म्हातारे, तुला सांगायलाच विसरलो बघ. पण तुझा नातू मला मागच्या महिन्यात भेटून गेला आणि म्हणाला….” माझ्या आजीला हे एक हजार रुपये द्या…. मला तिची खूप आठवण येते…. पण मी तिला भेटू शकत नाही…. मला ती खूप आवडते आणि मला तिची खूप आठवण येते हा निरोप तिला नक्की द्या …..”

आजीने या पाचशेच्या दोन्ही नोटा घेतल्या आणि चिल्लर सुद्धा…. आणि कपाळाला लावून ती रडायला लागली….. मी म्हणालो,  “ आता रडतेस कशाला म्हातारे ? नातवाने तुला गिफ्ट दिलंय ना ? आता तरी तू आनंदी रहा की…. पुढे कधीतरी येऊन भेटणारच आहे असं मला म्हणाला तो…. “ 

आजीने रडतच हात जोडले आणि मला खूण करून जवळ बोलावले…. 

आणि कानात म्हणाली, “ सगळ्या जगाने फसवलं मला….. आता तू सुद्धा फसवलंस….माझा नातू मरून दहा वर्षे झाली आहेत डाक्टर … !” 

अंगावर आलेले ते शहारे मी अजूनही घेऊन फिरतो आहे अश्वत्थाम्यासारखे….. !!!

(यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी माझा एके ठिकाणी शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार झाला…. सर्व वातावरण प्रसन्न आणि भारावलेले होते…. पण माझ्या डोक्यातून सकाळचा प्रसंग जात नव्हता….. 

माझं भाषण आटोपून मी माझ्या खुर्चीत बसलो आणि मला मिळालेल्या श्रीफळाकडे सहज पाहिलं, मला तोही हिरमुसल्या सारखा वाटला…! निर्जीव गोष्टींना भावना असतात मग सजीवांना का असू नयेत… ??? )

 

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares