मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ श्रावणसरी ☆ सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी) ☆

??

☆ श्रावणसरी ☘️ सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी) 

वालचंदनगर म्हटलं की बालपणीच्या आठवणी जागवतात. बालपणीचा पाऊस तर मनाला चिंब भिजवतो…. आपलं बालपण जपत..!आखिव -रेखीव असं हे निमशहरी गाव. माझं बालपण ,शालेय शिक्षण इथेच झालं. आमची शाळा घरापासून बरीच लांब. पावसाळ्यात छत्री असे पण ,कधी मुद्दाम विसरलेली ,पावसात चिंब भिजण्यासाठी.! पावसाळ्यात बऱ्याच वेळा शाळेला सुट्टीच असायची. नीरा नदीला पूरही येत असे. तो पहायला जाण्यात एक वेगळच थ्रिल असायचं. पाण्याच्या उंचच उंच लाटा, नदीवरचा मोठा पूल पाण्याखाली बुडालेला, हे सगळं पाहताना सारंच तेव्हा आश्चर्यजनक वाटायचं. पावसानं थोडी विश्रांती घेतली की सुट्टीच्या दिवशी शेजारपाजारचे सगळे मिळून नदीकाठच्या देवीला दर्शनासाठी जायचं. तेव्हा एकच बैलगाडी करायची त्यात जेवणाचे डबे अन चिल्लीपिल्ली कंपनी असायची . देवीचे दर्शन घेऊन जेवणाची पंगत बसायची .घारग्या, मटकीची उसळ ,तिखट मिठाच्या पुऱ्या,  शेंगदाण्याची चटणी , तांदळाची खिचडी आणि दही या मस्त बेताची छान अंगत पंगत व्हायची. जेवणानंतर नदीकिनारी एक फेरफटका व्हायचा नंतर मुलांची पतंगांची काटाकाटी नदीकाठी चालायची. पुरुष मंडळी ही त्यात सहभागी व्हायची. नाहीतर पत्त्यांचा डाव रंगायचा .बायका आणि मुली देवीची,पंचमीची गाणी म्हणायच्या. आम्ही मुली आणि मुलं पावसाची गाणी, कविता म्हणायचो. खूप मजा यायची .त्यातच एखादी श्रावण सर आली की इंद्रधनुष्य फार सुरेख दिसायचं. मग श्रावणसर अंगावर घेतच घाईघाईनेच घराकडे प्रयाण. खरंच श्रावणातलं पर्जन्यरूप किती सुंदर आणि वेगळच ..! जाई जुईचे झेले हातात घेऊन सुवास घ्यावा असे.. ऊन पावसाचा लपंडाव खेळणारा हा श्रावण..

त्यावेळी अगदी घरोघरी श्री सत्यनारायण ,जिवतीची पूजा असे. मंगळागौर तर नव्या नवरीला उत्सवच वाटायचा . सकाळी सकाळी फुलं ,पत्री, दुर्वा ,आघाडा,गोळा करायला जायचं .कुणाच्या दारातल्या फुलांवर डल्ला मारायचा.  कुणी मनानेच हौसेने फुलं द्यायचेही .त्याचा आनंद आजच्या फुलपुडीत कुठला?

श्रावण म्हटलं की आठवतो दारातल्या निंबाच्या झाडाला दादांनी बांधलेला दोरांचा झोका ..मैत्रिणींबरोबर घेतलेले उंचच उंच झोके ,मंगळागौरीचे खेळ, नागपंचमीची फेर धरून म्हटलेली गाणी,माईच्या हातची पुरणाची दिंड, नारळी पौर्णिमा- राखी पौर्णिमा, भावांना बांधलेली राखी ,गोकुळाष्टमीचे किर्तन. ..!

लग्नानंतर दौंडला आम्ही बंगल्यासमोर छान बाग जोपासली. आता सगळ्याच आठवणीत रंगताना दारातली बागच नजरेसमोर उभी राहिलीय…. कंपाऊंडच्या भिंतीलगत अबोली ,कर्दळीचे विविध प्रकारचे ताटवे ,प्राजक्ताचा सडा, टपोऱ्या विविधरंगी गुलाबांची झाडं, जाई- जुईचे फुलांनी डवरलेला वेल, वाऱ्यावर डोलणारा कृष्णकमळाचा वेल अन् फुलं, वृंदावनातील तुळशीच्या पानाफुलांचा सुगंधी दरवळ, दारातील झाडाला टांगलेल्या झोपाळ्यावर मैत्रिणींबरोबर झुलणारी माझी फुलराणी झालेली फुलवेडी लेक..!

– आता किती काळ गेला आयुष्य॔ बदललं .आताही श्रावण येतो, ऊन पावसाचा खेळ खेळतो .आणि मनांतला श्रावण मनांत पिंगा घालतो. मग…. आठवांच्या सरीवर सरी डोळ्यांतल्या श्रावणसरींबरोबर अलगद बरसू लागतात. …!

©  शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)

कोथरूड-पुणे.३८.

   मो.९५९५५५७९०८ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ आजची परिस्थिती… ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे ☆

श्री उदय गोपीनाथ पोवळे

??

☆ आजची परिस्थिती… ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे☆

निवडणुकीपर्यंत रोज  तेच ते … 

रोजची भाषणं , रोजची आश्वासनं 

तोच अत्याचार, नेहमीचा भ्रष्टाचार 

माझा तो बाबू, दुसऱ्याचा तो बाब्या 

मी आहे साधा, दुसरा तो सोद्या —–

 

निवडणुकीपर्यंत रोज तेच ते … 

नेहमीचे रस्ते, मोठाले खड्डे 

तुफान पाऊस, तुंबलेले पाणी 

संपावर कामगार, कचऱ्यांचे आगार 

आजारांना आमंत्रण, औषधांची वणवण —–

 

निवडणुकीपर्यंत रोज तेच ते … 

स्वतःची कमाई, दुसऱ्याची भरपाई 

खरे गुन्हेगार, खोटे साक्षीदार 

मोठी आशा, छोटी मदत 

नोकरीची कमी, बेकारीची हमी —–

 

निवडणुकीपर्यंत रोज तेच ते … 

माझे ते कायदेशीर, तुझे ते बेकायदा 

माझे ते खरे, तुझ्या त्या थापा 

मी प्रामाणिक, दुसरा मात्र चीटर 

माझी समाजसेवा, तुझे ते राजकारण—- 

 

निवडणुकीपर्यंत रोज तेच ते … 

मंदिर मस्जिद वाद, धर्म सगळ्या आड 

पाण्याची कमतरता, योजनांचा भडीमार 

सरकारी मदत, हातात नाही पडत 

महागाईचा भस्मासूर, संप मोर्चांचा आसूड —–

 

निवडणुकीपर्यंत रोज तेच ते…..

आमचे ते आमदार, फुटले ते गद्दार

करोडोची कमाई, ईडीची कारवाई 

सरकारी घोटाळे, मतदारांचे वाटोळे 

बातम्यांची वटवट, जनतेला कटकट 

निवडणुकीपर्यंत रोज तेच ते …..

 

निवडणुकीनंतरही रोज तेच ते …..

तेच ते —–

© श्री उदय गोपीनाथ पोवळे

१०-०७-२०२२

ठाणे

मोबा. ९८९२९५७००५ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ बंध राखीचे… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

??

☆ बंध राखीचे… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

रक्षाबंधन निमित्ताने विवेकची…माझ्या भावाची आठवण येते. सण साजरा होतो.

भावाला प्रेमाने नारळीभात, मिठाई खायला घालतो.त्याला ओवाळतो. भाऊही भेटवस्तू देऊन

बहिणीला खूश करतो.राखी पौर्णिमा साजरी होते !

पण मला आठवतो तो दिवस, जेव्हा विवेकने माझे खरोखरच रक्षण केले होते! त्याच्या विश्वासावर मी भरलेला ओढा पार करून गेले होते!

जवळपास ४०/४५ वर्षांपूर्वीची गोष्ट! मी तेव्हा हाॅस्टेलवर शिकायला होते.आणि माझा भाऊ नुकताच इंजिनिअर होऊन एस् टी मध्ये नोकरीला लागला होता.मी तेव्हा सांगलीत रहात होते आणि तो कोल्हापूरला होता.आई-वडील तेव्हा मराठवाड्यात नांदेड जवळील एका लहान गावात नोकरी निमित्ताने रहात होते.वडिलांची प्रमोशनवर बदली रत्नागिरीहून नांदेडला झाली आणि युनिव्हर्सिटी बदल नको म्हणून मी सांगलीलाच होते.दिवाळीच्या सुट्टीत घरी जायला मिळत असे.

त्या वर्षी नेहमी प्रमाणे मला सुट्टीसाठी नांदेडला पोचवायला विवेक येणार होता. तेव्हा एस् टी च्या गाड्याही फारशा नव्हत्या. संध्याकाळी कोल्हापूर -नांदेड अशी सात वाजता बस असे. ती दुसऱ्या दिवशी सकाळी

९-३०/१० पर्यंत नांदेडला जाई. अर्थात वाटेत काही प्राॅब्लेम नाही आला तर! त्यावर्षीचा तो प्रसंग मी कधीच विसरत नाही. दिवाळीच्या सुट्टीला जाण्यासाठी मी आणि माझा भाऊ सांगलीहून एस् टीत बसलो तेव्हा पाऊस होताच. कदाचित मिरजेच्या पुढे ओढ्याला पाणी असण्याची शक्यता होती. त्या मोठ्या ओढ्याचं नाव होतं हातीदचा ओढा! विवेक एसटीत असल्याने त्याला हे सर्व माहीत होते, पण नंतर वेळ नसल्यामुळे ‘आपण निघूया तरी’ असे त्याने ठरवले. मिरजेच्या स्टॅण्डवर त्याने ब्रेड, बिस्किटे,फरसाण असा काही खाऊ बरोबर घेतला होता. ठरल्याप्रमाणे आम्ही निघालो. शिरढोणच्या दरम्यान ओढा भरभरून वाहत होता. रात्रीचे नऊ वाजले होते. बाहेर धुवाधार पाऊस! रात्रभर आम्ही ओढ्याच्या एका तीरावर एस् टी मध्ये बसून होतो. पावसामुळे बाहेरचे वातावरण आणखीनच भयाण वाटत होते. कधी एकदा सकाळ होईल असं वाटत होतं!

एकदाची सकाळ झाली. गाडीतून खाली उतरून बाहेर पाहिले तर दोन्ही तीरावर भरपूर गाड्या अडकून पडल्या होत्या. कंडक्टरने सांगून टाकले की पाणी थोडं कमी झाले आहे, आपापल्या जबाबदारीवर पलीकडे जा आणि तिकडच्या एस टी.त  बसा! एक एक करत लोक ओढा पार करत होते. सामान डोक्यावर घेऊन चालले होते. माझे तर काही धाडसच होत नव्हते! भाऊ म्हणाला, ‘आपण जर असेच बसलो तर पलीकडे जाऊ नाही शकणार!’ आणि ओढा क्रॉस करण्याशिवाय दुसरा पर्याय नाहीये. शेवटी तो स्वतः एकदा ओढा पार करून  पाणी कितपत आहे ते पाहून आला. विवेक चांगला पोहणारा होता आणि मला तर अजिबात पोहता येत नव्हते. पाण्याची भीती वाटत होती, पण त्याने मला धीर दिला. मला म्हणाला, ‘ मी हात घट्ट पकडतो, पण तू चल .’ आणि खरंच, त्याने एका हातात सामान आणि दुसऱ्या हाताने माझा हात घट्ट धरून ओढ्यापलीकडे मला न्यायला सुरुवात केली. ओढ्यामध्ये काटेरी झुडपे, लव्हाळी यात पाय आणि साडी अडकत होते.. माझी उंची कमी असल्याने अधूनमधून पाण्यात पूर्णडोके खाली जाई, आणि गुदमरल्यासारखं होई. पण मला धीर देत आणि माझं मनगट घट्ट धरून विवेक मला नेत होता. कसेबसे आम्ही ओढ्यापलीकडे गेलो. नंतर बॅगमधील सुके कपडे आडोशाला बदलून दुसऱ्या गाडीत बसलो. आणि पुढचा प्रवास पार पडला! आयुष्याच्या प्रवासात असा एखादा आठवणींचा प्रवास माणसाला अंतर्मुख करतो. भावाचं नातं आणखीनच दृढ करतो… इतकी वर्षे झाली तरी मला तो दिवस तेवढाच आठवतो!

आणि भावाने बहिणीचे संरक्षण करायचं असतं ते कृतीने दाखवणारा माझा भाऊ डोळ्यासमोर उभा राहतो.. आता विवेक पंचाहत्तरीकडे वाटचाल करत आहे. पण अजूनही आमचे भाऊ बहिणीचे नाते तितकेच घट्ट आहे! ….

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ लेडीज फर्स्ट — भाग – 2 – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर ☆

? जीवनरंग ?

☆ लेडीज फर्स्ट — भाग – 2 – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर 

(बऱ्याचश्या मुलांना पालकांनी भाषण लिहून दिल्याचं जाणवत होतं, तरी मुलांची स्मरण शक्ती, बोलण्यातले उतार चढाव, श्रोत्यांच्या नजरेत बघून बोलणं, प्रत्येक गोष्ट खरोखर कौतुकास्पद होती. ) इथून पुढे —–

जवळजवळ पाच ते सहा भाषणं झाल्यावर रोहितचा नंबर आला. त्याने मात्र स्वतःच भाषण तयार केलं होतं , कारण शोभनाला तेच अपेक्षित होतं.

“व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, माझे गुरुजन आणि विद्यार्थी मित्रांनो, मला सर्वांत प्रिय व्यक्ती म्हणजे माझे बाबा ! मी असे का म्हणतोय ते तुम्हाला माझे बोलणे ऐकून झाल्यावर समजेलच.

बाबा मला अगदी छोट्या छोट्या प्रसंगातून खूप महत्वाच्या गोष्टी समजावून सांगतात. मी आपणासमोर काही प्रसंग सांगणार आहे. 

पहिली गोष्ट बाबांनी शिकवली ती म्हणजे, स्त्रीचा सन्मान. पण सन्मान म्हणजे नुसती पूजा नव्हे तर सक्षम बनवणं, संधी उपलब्ध करून देणे. बाबांनी जे शिकवले, तसंच ते स्वतः ही वागले.  

माझी आई जेव्हा लग्न होऊन घरी आली त्यावेळेस ती फक्त बारावी झालेली होती. घरात अगदी पुराणमतवादी वातावरण होते, पण बाबांनी सगळ्यांशी विरोध पत्करून आईला शिकवायचे ठरवले. तिला कॉलेजला अॅडमिशन घेऊन दिली आणि तिला स्वतःची स्कुटर दिली व ते स्वतः बसने जात. ते आईला म्हणत ‘ तुला घरातली सर्व कामं करून कॉलेजला जावे लागते खूप दमछाक होते तुझी. ‘ आणि  अश्याप्रकारे, आपल्या शाळेला लाभलेल्या ह्या आदर्श मुख्याध्यापिका साकारल्या.

एवढंच नाही तर तीन वर्षांपूवी बाबांना बँकेमार्फत फोर व्हिलर गाडी मिळाली, त्यावेळेस देखील बाबा आईला म्हटले ‘ तू गाडी वापरत जा, मी जाईन स्कुटरने. हे बघ तू शिक्षिका आहेस, शिक्षकांनी शाळेत कसं भरपूर ऊर्जेने जायला हवं, कारण तुम्ही शिक्षक लोक पिढ्या घडवायचं काम करता, तुम्ही जेवढे कम्फर्टेबल असणार तेवढं मुलांना चांगलं शिकायला मिळेल.’  

दुसरी गोष्ट सांगतो, त्यांनी नेहमी श्रमाला प्रतिष्ठा द्यायला शिकवले. घरी येणारा कोणीही कष्टकरी असो, त्याला प्रेमाने वागवायचे असे ते सांगत. कधीही छोट्या छोट्या व्यावसायिकाबरोबर पैशाची घासाघीस करू देत नसत. 

अगदी रस्त्यावरून जातांना एखादा ढकलगाडीवाला जरी जात असेल, तर ते त्याला आधी जाऊ देतात . ते म्हणतात,

 ‘ आपल्याला गाडीवर जायचं असतं, पण त्याला एवढं वजन स्वतः ढकलत न्यायचं असतं.’

त्यांनी शिकवलेली अजून एक गोष्ट सांगतो. खरं म्हणजे तो एक प्रसंग होता. माझी परीक्षा जवळ आली होती आणि मी आईला, पहाटे लवकर उठवायला सांगून झोपलो होतो, पण तिने उठवले नाही आणि मग मला उशिराने जाग आल्यावर जोरात भोंगा पसरवला. घरात मोठाच गोंधळ निर्माण झाला. मी काही ऐकायच्या मनस्थितीत नव्हतो, तेव्हा बाबा आले आणि मला बाजूला नेऊन म्हणाले, ‘ मी काय सांगतो ते नीट ऐक आणि मग ठरव, रडायचं की काय करायचं. हे बघ बाळा दुसरी मुलं अभ्यास करायला लागतो म्हणून रडतात.  पण आमचा मुलगा अभ्यास करायला मिळाला नाही म्हणून रडतो , किती भाग्यवान आहोत आम्ही. आणि दुसरं एक सांगतो, आपल्याला येणाऱ्या अडचणी, दुःख आणि सुख या सर्व गोष्टींना आपण स्वतःच जबाबदार असलं पाहिजे. असं असेल तरच आपल्याला त्यातून मार्ग काढायला सुचतं. दुसऱ्याला जबाबदार धरलं तर कधीही तो प्रश्न सुटत नाही. आता तूच ठरव, जे झालं त्याला कोण जबाबदार?’

बाबाचं म्हणणं ऐकून मला एकदम काहीतरी सुचलं, रडणं बिडणं कुठेच पळून गेलं. दुसऱ्या दिवसापासून मी घड्याळामध्ये अपेक्षित वेळेचा गजर लावून झोपू लागलो आणि तेव्हापासून अगदी वेळेवर, कुणीही न उठवता देखील उठतो.

असे कितीतरी प्रसंग सांगता येतील, पण वेळेचं भान ठेवलं पाहिजे. 

तर अशाप्रकारे बाबांनी मला बरीच अमूल्य अशी मूल्ये शिकवली. आईने शरीराचं संगोपन केलं तर बाबांनी संवेदनशील मन जोपासलं. 

आई ही हिऱ्याची खाण असेल तर बाबा त्यातला हिऱ्यांना पैलू पडणारे जवाहीर आहेत. 

आणि म्हणून माझी सर्वात आवडती व्यक्ती म्हणजे माझे बाबा. आई तर प्रिय आहेच, परंतु आईपेक्षाही बाबा माझ्यासाठी माझे हिरो आहेत. माझे बाबा इज द ग्रेट..!

सर्वाना नमस्कार, जय हिंद !”

रोहितचं भाषण संपल्यावर सगळे उभे राहिले आणि बराच वेळ टाळ्या सुरू होत्या. 

बक्षीस अर्थात रोहितलाच मिळाले. बक्षीस वाटपाच्या वेळेस त्याच्या आई आणि बाबांना देखील स्टेजवर बोलवण्यात आले. कुलगुरूंच्या हस्ते बक्षीस वाटप होते. शोभनाला आज आपल्या नवऱ्याचा आणि मुलाचा खूप अभिमान वाटला.

विजयला तर जणू  जगण्याची नवी उमेद मिळाली, आणि रोहित– रोहितच्या आनंदाचे खरे कारण तर फक्त त्यालाच माहीत होते. 

बक्षीस वाटपाच्या वेळी विजय सर्वात मागे उभा होता तेव्हा कुलगुरू म्हटले, “विजयराव पुढे या .”

तेव्हा विजय नम्रपणे म्हणाला , “नाही सर,  लेडीज फर्स्ट.. !”

—  समाप्त —

लेखक : अज्ञात. 

संग्राहिका : बिल्वा अकोलकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मी कृतज्ञ आहे… ☆ सौ .कल्पना कुंभार ☆

सौ .कल्पना कुंभार

??

☆ मी कृतज्ञ आहे… ☆ सौ .कल्पना कुंभार ☆

मी कृतज्ञ आहे

त्या विद्यामंदिराची ..

जिने मला घडवले

ओळख करून दिली जगाची ..

 

बोट पकडूनी आईचे .. टाकले

पहिले पाऊल त्या मंदिरात…

कुशीत घेतले बाईनी ..

नेले मला वेगळ्याच विश्वात..

 

 गिरवायला शिकवले ग म भ न 

 जिथे बोट धरुनी बाईंनी..

मी नेहमीच कृतज्ञ त्या शाळेशी 

अलंकृत केले मला जिने संस्कारांनी..

 

शाळेच्या त्या चार भिंतीत

आयुष्याचे ध्येय समजले..

पंखात भरारी घेण्याचे

बळही तिनेच दिले…

 

मित्र मैत्रिणी..सखे सोबती

भेटले त्या मंदिरात…

सरस्वतीचा वरदहस्त

बाईंच्या आशीर्वादात..

 

क्रीडांगणावर रमले मन

व्यायामाने सुदृढ तन..

राष्ट्रभावना जागृत होण्या

साजरे केले राष्ट्रीय सण…

 

अभ्यासाबरोबरच कलेशी

नाळ जोडली जिथे अलवार ..

वर्तन घडता काही चुकीचे

कधी कधी मिळाला छडीचा मार ..

 

नेहमीच मी कृतज्ञ

माझ्या या शाळेशी ..

घडवले मला जिने 

नाळ जोडली मातीशी ..

        

मला अजूनही आठवतो तो दिवस .. शाळेचा पहिला दिवस.. किती रडले होते मी.. आणि त्यानंतर एक वेगळच जग अनुभवलं.. माझ्यासारखेच रडणारे कितीतरी जण.. पण प्रत्येकाच्या पाठीवरून हात फिरवत.. त्याच्याशी गोड बोलून त्याला कुशीत घेणाऱ्या बाई.. रडता रडता एकमेकींकडे पहात .. हात घट्ट पकडून ठेवणाऱ्या मैत्रिणी.. मला इथेच भेटल्या..

चार भिंतीच्या या शाळेत काय काय नाही शिकले मी.. अभ्यास तर होतच होता.. पण माझ्यातला लेखनाचा गुणही इथेच सापडला मला.. कला, क्रीडा, विविध गुण दर्शन या कार्यक्रमातून आम्ही सगळेजण समृद्ध होत गेलो… अन् अमाप कौतुक नजरेत  साठवत ही शाळा आम्हाला घडवत गेली..

चुकताना सावरलं अन् आयुष्याचं एक ध्येय दिलं.. ते ध्येय पूर्ण करण्यासाठी पंखांना पुरेस बळही दिलं ते शाळेनेच.. सांस्कृतिक कार्यक्रमातून.. खेळातून.. विविध उपक्रमांतून.. जणू ही शाळा आम्हा सगळ्यांना आकार देत होती… घडवत होती.. घडवताना ठोकेही देत होती बरं का…

आज मागे वळून बघताना सगळ अगदी सगळ आठवतं.. अन् या माझ्या विद्यामंदिरा बद्दल मन कृतज्ञतेने भरून येत… त्यावेळी नाही व्यक्त होता आलं.. पण आता या माध्यमातून मला नक्कीच कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी मिळाली आहे..

मी खूप कृतज्ञ आहे माझ्या शाळेशी..

शतशः नमन तिच्या प्रत्येक पायरीशी ..

तिच्या प्रत्येक कोपऱ्यात साठवलेल्या आठवणींशी…

 

© सौ .कल्पना कुंभार

इचलकरंजी

मोबाईल : 9822038378

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ आला आषाढ – श्रावण ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

??

☆ आला आषाढ – श्रावण ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

चैत्र वैशाखात  उन्हाळ्याची काहीली होत असताना अचानक एक दिवस आभाळ भरून येते !

ढगांचा कडकडाट आणि विजांचा लखलखाट सुरू होऊन  पावसाचे टपोरे थेंब येतात. गारा पडतात. जणू तुटे गारा मोत्यांचा सर… जमिनीवर ओघळून येतो ! वळीव येतो आणि हवेत थोडा गारवा निर्माण होतो. पण पुन्हा  हवा गरम होते आणि आता प्रतीक्षा असते ती पावसाची ! असे दोन-चार वादळी पाऊस झाले की मग मात्र त्या ‘ नेमेची येतो मग पावसाळा ‘ ची ओढ लागते. ज्येष्ठ उजाडतो आणि अजून जर पाऊस नसेल तर ‘ पावसा, कधी रे येशील तू?’ असं म्हणत त्याची आराधना केली जाते. आंबे,करवंदे,जांभळे ,फणस हा उन्हाळ्याचा मेवा आता संपत येतो.सात जून उजाडला की साधारणपणे पावसाचे आगमन होते.पण ८/१० दिवस जरी पुढे गेला की लोकांच्या तोंडचे पाणी पळते ! लगेच पाणी नियोजन सुरू होते ! पण निसर्ग माणसाइतका लहरी नसतो. लवकरच पावसाचे आगमन होते. आषाढाचा पाऊस सुरू होतो. वर्षा गाणी ऐकू येऊ लागतात.’ ये रे ये रे पावसा..या बाल गीतापासून मंगेश पाडगावकरांच्या पाऊस  गाण्यापर्यंत ! सकाळच्या अधूनमधून पडणाऱ्या सोनसळी उन्हात पावसाचे थेंब हिऱ्याप्रमाणे चमकू लागतात आणि मन कवी बनतं  !’ जागून ज्याची वाट पाहिली,ते सुख आले दारी ‘ असे म्हणत आलेल्या गारव्यात मन पावसाचा आनंद घेत रहाते. ‘ रिमझिम पाऊस पडे सारखा…’ म्हणतच ज्येष्ठी पौर्णिमेला पावसात वडाची पूजा करताना सृष्टीच्या बदलत्या रूपाचा आपण आस्वाद घेत असतो. वर्षा सहली निघतात,कांदा भज्यांची आॅर्डर येते.कांदे नवमी साजरी होते.आणि आषाढाचा आनंद दरवळू लागतो. गुरू पौर्णिमा बरेचदा पावसात 

भिजतच साजरी होते.आणि निसर्ग हाच गुरू हे मनावर अधिकच ठसते !      

आठ पंधरा दिवसातच सृष्टी बालकवींची ‘ श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे..’ ही  कविता आठवायला लावते. हिरवा शेला पांघरून श्रावणातील सणांना सामोरी जाण्यासाठी सृष्टी नटून सजून बसते ! पावसाची नक्षत्रे सर्व नक्षत्रात महत्त्वाची आणि चैतन्याला जास्त पोषक असतात. अन्न आणि पाणी दोन्ही गरजा पुरवण्यासाठी पाऊस आवश्यकच असतो, पण अधूनमधून पावसावर चिडायला होते. त्याच्या सतत कोसळण्याने आपले काही बेत पाण्यातून वाहून जातात, पण तो निसर्ग राजा त्याच्याच तालात येत असतो. त्याच्या मनाप्रमाणे तो सगळीकडे बरसत असतो. कुठे पूर तर कुठे दरडी कोसळणे, तर कुठे वाहतूक खोळंबणे असे चालूच असते, पण तरीही पाऊस आपल्याला हवासा वाटतो. बघता बघता श्रावण येतो. आणि हसरा श्रावण सणांची माला घेऊन येतो .’ रिमझिम पाऊस पडे सारखा ‘…’असा पडणारा पाऊस श्रावणामध्ये ‘ श्रावणात घन निळा बरस ना ‘ असे गाणे गात येतो. प्रेमिकांचा आवडता श्रावण, कवी लोकांचा आवडता श्रावण, उत्सवप्रेमींचा आवडता श्रावण, सणासुदीचे दिवस असलेला श्रावण गाणी गात गात येतो  !’ घन घन माला नभी दाटल्या कोसळती धारा ‘…’ हे आषाढाचं गाणं आता श्रावणात बदलतं– कधी ऊन तर कधी पाऊस असं निसर्गाचे मनमोहक रूप दिसू लागते. सुखाची,आनंदाची सोनपावलं उमटवत श्रावण बरसत असतो. सगळीकडे सस्यशामल भूमी डोळ्यांना आनंद देत असते. बघता बघता नारळी पौर्णिमा येते. पाऊस थोडा कमी होऊ लागतो.. रक्षाबंधन, नारळी पौर्णिमा सण येतो. कोळी लोक समुद्रावर मासेमारीसाठी जाण्यास सुरुवात होते. सभोवतालचे वातावरण हिरवेगार, नयनरम्य होते. मग ओढ लागते ती भाद्रपदाची ! श्रावणाला निरोप देता देता गणपती बाप्पाची चाहूल लागते. पावसाचा जोर कमी होऊ लागतो. सगळीकडे आनंदीआनंद पसरू लागतो….. 

…. पण तो मनात मुरलेला, भिजलेला श्रावण अजूनही आपल्याला खुणावत असतो. त्याचे ते लोभस रूप पुन्हा पुन्हा दरवर्षी आपण नव्या नव्हाळीने अनुभवतो.  .’अस्सा श्रावण सुरेख बाई ‘…. .अनुभवतो…आणि मंगळागौरीच्या फेरासारखा तो मनात घुमत रहातो…

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ माय…! ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ माय…! ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

जे झोपेत दिसतं ते स्वप्नं नव्हे, ज्याने झोप येत नाही ते स्वप्नं….

असंच एक स्वप्न पाहिलंय, भिक्षेकऱ्यांना, आणि कष्टकऱ्यांना गावकरी बनवण्याचं….. तुमच्या सर्वांच्या साथीनं …! 

भीक मागून सुद्धा पैसे मिळतात…. परंतु त्या पैशाला किंमत नसते आणि मोल सुद्धा…. 

कमावलेल्या पैशाला, नुसती किंमत नको….. मोल हवं मूल्य हवं ….! 

“हात” न हलवता मिळालेल्या पैशाला लगेच “पाय” फुटतात… !”

 हा असा मिळालेला पैसा टिकत नाही… ! 

तर …. एक बाबा आहेत….

त्यांना मंदिराबाहेर भाविकांना गंध लावायचं काम लावून दिलं आहे… भांडवल फक्त दोनशे रुपये सहा महिन्याला….

येणार्‍या जाणार्‍या भाविकांना हे बाबा गंध लावतात आणि भाविक लोक यांना पाच / दहा / वीस रुपये दक्षिणा म्हणून  देतात…. दिवसाला पाचशे रुपये आता हे बाबा कमावतात… ! 

समाजातल्या रुढी-परंपरांचा आम्ही अशाप्रकारे माणसांना उभं करण्यासाठी उपयोग करतो आहोत .. ! 

या सहा दिवसात तीन दिव्यांग लोक भेटले….

यातील एकाला आपण व्हीलचेअर दिली आहे, या व्हीलचेअरवर बसून तो अनेक वस्तूंची विक्री करेल, दुसऱ्याला शिलाई मशिन घेऊन देत आहोत, फाटलेल्या आयुष्याला तो टाके घालेल आणि तिसऱ्याला एक छोटे शॉप घेऊन दिले आहे त्यात तो किराणा माल किंवा तत्सम वस्तू विकेल…. 

माझा दिव्यांग सहकारी श्री. अमोल शेरेकर यांच्या माध्यमातून समोर आलेले हे तीनही लोक…. 

मी काही करण्याअगोदर समदुःखी असलेल्या अमोलने या तीनही लोकांसाठी आधीच बरंच काही केलं आहे….

माझा सहकारी श्री मंगेश वाघमारे यानेही या कामी खूप कष्ट घेतले…. दोघेही बाप से बेटे सवाई निकले !

ऋणी आहे दोघांचा …. !! 

“बाप” या शब्दावरून आठवलं ….

लहान असताना माझ्या बापाला वाटायचं, पोरानं शाळेत “नाव” “काढावं” …. पण माझ्यासारख्या टारगट पोराला पाहून, शाळेनेच तेव्हा माझं “नाव” पटावरून “काढलं” होतं…! 

 हा…हा..हा…असो ! 

(मी लिवलेल्या पुस्तकात आशे लई किस्से हायेत…)

एप्रिल महिन्याच्या एक तारखेपासून ते आत्ता सहा तारखेपर्यंत अनेकांनी आपले हात पाय मोडून घेतलेले आहेत…. हौसेने नाही… दुर्दैवाने…. ! असे सहा गंभीर रुग्ण रुग्णालयात दाखल केले आहेत…सर्वांची ऑपरेशन्स झालेली आहेत …. ते मस्त आता टुमटुमीत आहेत… खाऊन पिऊन गोल गरगरीत झाले आहेत पोट्टे…. 

परवा त्यांना गमतीने म्हणालो, ‘ ए बटाट्यानो, कायतरी काम करा बे पोट्टेहो…! काय पडून राहिला बे असे ? ‘

‘ सांगून तर पाह्यना रे डाक्टर… काय बी करू…. तू सांगून तर पहाय ना रे भौ… तुझ्यासाटी कै पण करू ना रे भौ…’

—-हे मान तर देतात…. पण अरे तुरे बोलतात…. पण तरी लय भारी वाटतं ना रे भौ….! 

 

माझे दैवत आदरणीय श्री गाडगे बाबा…. त्यांच्याच भागातली ही वाट चुकलेली पोरं….

त्यांची शपथ घालून, काम करेन पण भीक मागणार नाही असं यांच्याकडून वचन घेतलंय….! 

—-“ माझ्यासाठी काही करु नका रे भावांनो….रस्त्याने चालताना नेहमी मागे वळून पहात जा…. कारण मागे वळून न पाहणारे…  पुढे कुठेतरी धडपडतात….भविष्यकाळाकडे चालत असताना, भूतकाळाकडे नेहमी लक्ष ठेवावं … म्हणजे आपले अपघात होत नाहीत…  “

ते सर्व जण हसले होते…

 

रस्त्यावर असंच एकदा काम करत असताना याच महिन्यात पाय अक्षरशः  कुजलेला एक तरुण माझ्यासमोर आला…. ! रस्त्यावरच याचे ड्रेसिंग करून त्याला ऍडमिट केला आहे…. जाताना रडत मला म्हणाला, ‘ सर, मी मागल्या आयुष्यात काहीतरी वाईट काम केलं असेल …. म्हणून या आयुष्यात मला अशी शिक्षा मिळाली असेल…. ! यातून मी कधीच उभा राहू शकणार नाही असं मला वाटतं…. मी कधीच यशस्वी होणार नाही असं मला वाटतं सर…’ 

 

त्याला सहज म्हणालो, ‘ नाही रे मित्रा, कर्माला दोष देऊ नकोस,  तू जे केलंस ते तुझ्याकडून कोणीतरी करवून घेतलं आहे आणि लक्षात ठेव “कर्माला” दोष देणारा “कर्ता” कधीच होऊ शकत नाही… ! कोणालाही दोष न देता “कर्म” करत रहा…. आपोआप तू “कर्ता” होशील…. “क्रिया” करणारे “पद” होशील… !’ 

‘आणि हो मित्रा, तुला जर यशस्वी व्हायचं असेल, तर आधी अयशस्वी लोकांचा तुला अभ्यास करावा लागेल… ते जिथे चुकले त्या चुका तुला टाळाव्या लागतील….!’   विचार करतच तो ऍडमिट झाला…. !

 

रस्त्यावर अक्षरशः पडलेले एक बाबा…. यांना अवघड जागी गाठ आली होती…. ती जवळपास संत्र्याएवढी झाली… पुन्हा फुटली आणि हे विष संपूर्ण शरीरात पसरले…यांनाही ऍडमिट केले आहे…

 

देवीपुढे जोगवा मागणाऱ्या एका ताईला, ईदच्या निमित्ताने, मस्जिद पुढे विकण्यासाठी चादरी घेऊन दिल्या आहेत…

 

म्हटलं ना…. समाजातील रुढी-परंपरांचा उपयोग आम्ही लोकांना उभं करण्यासाठी करत आहोत….! 

 

मला मेथीची भाजी आणि बाजरीची भाकरी आवडते,  हे आमच्या एका भीक मागणाऱ्या आजीला माहित आहे…. एके दिवशी तिने मेथीची भाजी आणि बाजरीची भाकरी घरून तयार करून आणली….मला दिली… मी म्हणालो, ‘ पुढे वाटेत खातो कुठे तरी….’ 

ती म्हणाली, ‘ न्हायी माझ्यासंगट खा…,’ 

हात धुऊन मग तिच्याच ताटात बसलो जेवायला…. ! 

ती दिलखुलासपणे हसली…. !  माझ्याकडं कौतुकानं बघत बाजूच्या आया बायांना म्हणाली, ‘ बग गं कसं खातंय माजं लेकरू मटामटा, किती भुकेजलेलं हाय….’  असं म्हणून तिने चारदा डोक्यावरुन हात फिरवला, पदराने तोंड पुसलं …! मेथीची भाजी – भाकरी खाताना सहज तिच्याकडे पाहिलं…. आणि काय आश्चर्य…. मला तिथंच माजी माय दिसली….!!!

© डॉ मनीषा आणि डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ प्रवास… ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे ☆

श्री उदय गोपीनाथ पोवळे

??

☆ प्रवास… ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे ☆

होतो कुठे, आलो कुठे, काही कळेना 

हरलो का जिंकलो, काही उमजेना 

जीवनाच्या प्रवासात चालत राहिलो 

 आलेल्या प्रसंगाशी लढत राहिलो —

 

खाच खळगे, काट्या झुडपातून मार्गस्थ झालो 

 धडपडत, चाचपडत, पडून, उभा राहिलो

 तरतरीत, टवटवीत होऊन ताजातवाना झालो 

 पुढे मखमली गालिच्यावरून चालत राहिलो पण —

गालिच्याखालची टोकेरी दगड टोचत राहिली 

 जमिनीवरच्या मातीची आठवण देत राहिली —

 

काही प्रसंगी हरून जिंकलो  

तर काही प्रसंगी जिंकून हरलो 

काही लढाया डोक्याने लढलो 

तर काही लढाया मनाने जिंकलो 

 

—डोक्याच्या लढायांना सर्व साथीला होते 

     मनाच्या लढायांना फक्त हृदयच साक्षीला होते —

 

काय कमावले, काय गमावले हिशोब जुळत नाही 

काय जमवले, काय हरवले काहीच कळत नाही—

 

सुख दुःखाच्या खेळामध्ये कठपुतळी झालो 

 नशिबाच्या लाटेवर तरंगत वहात राहिलो —

 

 सुख काय, दुःख काय, सारे सारखे वाटत गेले 

 त्याच्या पलीकडे जाऊन—

 माणूस होऊन, दुसऱ्यांसाठी, जगावेसे वाटत राहिले —

 

होतो कुठे, आलो कुठे, काही कळेना 

हरलो का जिंकलो, काही उमजेना 

पण महत्वाचे हे की —

जीवनाच्या प्रवासात चालत राहिलो 

सुखदुःखाच्या पलीकडे बघत राहिलो —

 

आणि—

आणि फक्त नी फक्त— 

आनंदाची देवाण घेवाण करत राहिलो 

आंनदाची देवाण घेवाण करत राहिलो 

© श्री उदय गोपीनाथ पोवळे

ठाणे

मोबा. ९८९२९५७००५ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ सविताची व्यथा… ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले

 ? मनमंजुषेतून ?

☆ सविताची व्यथा… ☆ डॉ. ज्योती गोडबोले☆ 

मध्यंतरी  एका शिबिरासाठी एका खेडेगावात गेलो होतो. शिबिर झाले, पण ड्रायव्हर येईपर्यंत म्हटले, जरा फिरुया बाजारात.– खेड्यातला तो बाजार. पण तो बघतानाही गम्मत आली आम्हाला.

सहज मागे बघितले तर चेहरा खूप ओळखीचा वाटला. मी हाक मारायच्या आधीच तिने मला हाक मारली.

“ अग, इकडे कुठे तू?” 

सविता मध्ये फारसा बदल नव्हता झाला. अंगाने भरली होती,आणि श्रीमंतीचे तेज मात्र आले होते अंगावर.

“ सविता, इकडे राहतेस तू? अशा खेड्यात ?”

“ हो ग..चल बघू घरी माझ्या.” –तिने मला ओढतच तिच्या घरी नेले. छानच होता तिचा बंगला. शहरी पद्धतीने बांधलेला, सगळ्या आधुनिक सोयी असलेला. तिने बाईला हाक मारून चहा आणि काही खायला आणायला सांगितले.

“ सविता, कित्ती वर्षानी भेटतोय आपण. पुण्याला येत नाहीस का  कधी? आणि मुलं ?”  मी विचारले.

“ मुलगी चित्रा लग्न होऊन दिल्लीला गेली. मुलगा कुणाल डॉक्टर झाला,पुढचे शिकायला ऑस्ट्रेलियाला गेलाय.”

सविताचे सगळे चांगलेच झालेले दिसत होते.

सविता म्हणाली,” आठवतंय तुला ? अठराच वर्षाची होते ग मी. रमेशच्या प्रेमात पडले. त्याची आमची जात वेगळी, आई बाबांनी केवढा तमाशा केला, त्यावेळी घरातून पळून जाऊन लग्न करणे म्हणजे दिव्यच होते. पण आमच्या समोर दुसरा पर्यायच नव्हता. तोही बिचारा शिकतच होता. मेडिकलच्या शेवटच्या वर्षाला होता. त्याच्याही घरी विरोधच होता. तुला माहीत आहे की, तू आलेली होतीस मला भेटायला. नव्या पेठेत एका खोलीत रहात होतो बघ भाड्याने. तुला सांगते, नवीनवलाई संपल्यावर खाडकन डोळे उघडले दोघांचे. रमेशला कधीही कष्टाची सवय नाही,

घरून तो म्हणेल तितके पैसे यायचे .पण  हे सगळे बंद झाले. फार कठीण गेले ते आम्हाला. एका हॉस्पिटलमध्ये रात्रपाळीची नोकरी धरली त्याने. पगार किती माहीत आहे? दोनशे रुपये. मी तर कॉलेज सोडूनच दिले होते.  आईबाबांनी माझे नावच टाकले. पण सुदैवाने रमेश पास झाला. हातात डॉक्टरची डिग्री तरी आली. मग गेला वडिलांना भेटायला. त्यांनी आधी खूप  तांडव केले. पण निदान,भर बाजारपेठेतली एक पडकी ओसरी दिली. रमेशने त्या जागेत दवाखाना सुरू केला. तिथेच मागे अर्ध्या जागेत आम्ही संसार थाटला. माझ्या मावशीने  लपून छपून दिलेली चार भांडी,यावर सुरू केला मी संसार. अतिशय हाल काढले बघ आम्ही. पण देवाचीच कृपा म्हणायची,

हळूहळू रमेशचा जम बसायला लागला. त्याच्या हाताला यश येऊ लागले. पेशंट वाढायला लागले. मग सासऱ्यानी दुसरी मोठी जागाही दिली. तिकडे रमेशने आधी एक मजला बांधला. तुमच्या पुण्याचेच सर्जन बोलावून आम्ही छोटेसे हॉस्पिटल सुरू केले. दर रविवारी पुण्याहून येत सर्जन..तेव्हा हे गाव इतकेही नव्हते वाढले ग. गरज होती इथे हॉस्पिटलची… किती काय सोसलेय सांगू तुला.” सविताच्या डोळ्यात पाणी आले. “ आता समजते बरं कोणाचाही आधार नसला की  काय वाटते ते. काय ग वाईट होते रमेशमध्ये. मी इतकी सामान्य, बुद्धीनेही,दिसायलाही.

पण नाही.आईने कायमच वैर धरले माझ्याशी. मला मुलगी झाली ना, तर आईबाबा बघायलाही नाहीआले.

कसले ग हे पीळ माणसाला—मीच माझे बाळंतपण करून घेतले. ठेवली एक बाई मदतीला. कसले ग ते  बाळंतपण.

पण रमेश सतत माझ्या बरोबर होता. आम्हाला होतेच कोण? सासरचे बघायला पण आले नाहीत मुलीला.”

सविताला खूप वाईट वाटत होते.

“ तू माझी अगदी शाळेतली मैत्रीण म्हणून मी हे सांगतेय तुला. तुलाही खूप हळहळ वाटली होती तेव्हा.”

“ हो ग सविता. मी तुला भेटायला आले होते, तेव्हाचा तुझा अवतार अजून आठवतोय. गळ्यात काळी पोत, आणि हातात नुसत्या काचेच्या चार बांगड्या.” 

“ हो ना.आणि त्या खोलीचे भाडे कसे देणार,ही चिंता. तुला सांगते,इतका पश्चात्ताप झाला दोघांना. नव्याचे रंग एका महिन्यात उडून गेले, जेव्हा बाहेरचे पिठामिठाचे भाव समजले.”

“ अग मग निदान रमेश डॉक्टर होईपर्यंत तरी का नाही थांबलात? रागावू नको हं मी विचारले म्हणून.”

“ कसे थांबणार होतो बाई.आईने कोंडून ठेवले होते मला. तुला माहीत आहे नं ती कशी होती ते. वर पुन्हा कोणतातरी मुलगा आणला, म्हणाली, ‘ चार दिवसात लग्न लावते बघ तुझे याच्याशी.’  मी कशीबशी निसटले. मग लग्न करण्याशिवाय पर्यायच नव्हता बघ.” 

एक सुस्कारा टाकून ती पुढे म्हणाली.,“ आता मागे वळून बघितले तर वाटते, मी हे धाडस का केले आणि त्यालाही करायला लावले. हा चकवा माणसाला भुलवतो, काही सुचू देत नाही बघ. कसले प्रेम अन काय ग. भूलच पडते बघ बुद्धीवर.” सविताला हुंदके अनावर झाले.

मी तिला जवळ घेतले, “अग वेडे,आता झाले ना सगळे छान? मुलगा डॉक्टर झाला, मुलगी शिकली-सुखात आहे सासरी. चांगली डॉक्टर सूनबाई आलीय. काय हवे अजून तुला?”

सविता म्हणाली, “ तेही खरेच ग. पण आधीच्या जखमा विसरू म्हणता विसरता येत नाहीत ना .मूर्खासारखी शिक्षण सोडून बसले. रमेशला पुढचे शिकता आले नाही.–असो. म्हणून मी एक धडा घेतला. मुलांना सांगितले,आपली शिक्षणे पूर्ण झाल्याशिवाय, पायावर उभे राहिल्याशिवाय लग्न नाही. मुले गुणी निघाली ग माझी. सून आणि मुलगा, पुढे शिकायला ऑस्ट्रेलियाला गेलेत. सून माझी डोळ्यांची सर्जन आहे आणि लेक मुलांचा डॉक्टर. केली की नाही जिद्द पुरी.”

“ सविता, खरोखर जिंकलेस हो, या यशासारखे दुसरे यश नाही.”

“ हो ग. पण या सगळ्यात माहेर तुटले माझे. आईबाबा कधीही आले नाहीत. मी गेले होते चार वेळा. पण त्यांनी दारही उघडले नाही मला.”

“ सविता,जाऊ दे ते. छान केलास की संसार.”

सविताने मला तिचे घर दाखवले. हॉस्पिटल दाखवले. रमेशलाही  खूप आनंद झाला मला भेटून.

‘आता मुलगा आला की आणखी दोन मजले वर बांधणार आहोत ‘ म्हणाला.

निघताना सविताने माझी ओटी भरून सुंदर साडी दिली. मला अगदी अवघडल्यासारखे झाले.

“नाही म्हणू नको ग. तू आमचे सगळे सगळे  दुर्दैवाचे अवतार बघितलेस. आता  आमचे हे  वैभवही  तू बघावेस ही देवाचीच इच्छा होती. नाहीतर तू असल्या खेड्यात कशाला येशील आणि आम्हाला भेटशील ? आता  लेकाचे मोठे हॉस्पिटल बांधून होईल तेव्हा नक्की येशील ना?”  रमेशने मनापासून विचारले.

“ नक्की येणार. भाच्याचे आणि सूनबाईचे कौतुक करायला.” मी म्हणाले.

सविता रमेशने मनापासून पुन्हा यायचे आमंत्रण देऊन मला निरोप दिला.

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझिया माहेरा जा – लेखिका – सौ. रेणुका आशिष ओझरकर ☆ प्रस्तुती – सौ. विद्या पराडकर ☆

सौ. विद्या पराडकर

? मनमंजुषेतून ?

☆ माझिया माहेरा जा – लेखिका – सौ. रेणुका आशिष ओझरकर ☆ प्रस्तुती – सौ. विद्या पराडकर ☆

 ~माझ्या जीवनाचे शिल्पकार 

लग्न होऊन मी माप ओलांडून सासरी आले. सुखाच्या व आनंदाच्या पायघड्यावरून माझी पावले पडलीत. कालची मुलगी आज सून झाली. मुलगाही एकुलता एक- इंजिनियर- गुणसंपन्न- पती म्हणून मला लाभला.

आई-वडिलांची उणीव भासू न देणारे सासू-सासरे, बहिणीची उणीव भासू न देणारी माझी नणंद या सर्व गोकुळात मी व्यस्त होते.

मला तीन भाऊ व मी शेंडेफळ, अत्यंत लाडात वाढलेली जणू लाडू बाई.  माझ्या संसारात मी पूर्णपणे रमले होते. पण म्हणतात ना कळीचे फूल कधी झाले, वेलीला वृक्षाचा आधार केव्हा मिळाला, हे सर्व स्वप्नाप्रमाणे घडले. 

मनपाखरू क्षणार्धात भूतकाळात विहार करावयास लागले—–

माझे माहेर नागपूरचे.  टुमदार व सुंदर माझे घर.  समोरचे मोठे अंगण, त्या अंगणात तुळशी वृंदावन, सुरेख व सुबक रांगोळी सजलेली समोरील बाजू, स्वागत करण्याकरता फाटकाच्या दोन्ही बाजूला जाईचा नाजुक वेल, थोडं पुढे गेल्यावर गुलाब व शेवंती वाऱ्यावर नाचत असताना दिसतात.  मागे पेरू व सिताफळाचे झाड, परसदारी आळू कोथिंबीर खेळत असतात. गोड पाण्याची विहीर मुक्तहस्ताने सर्वांची तृष्णा तृप्त करीत होती . आम्ही वरच्या मजल्यावर रहायचो.  खाली माझे आजोळ होते.

माझे आई बाबा दोघेही नोकरी करणारे. त्यामुळे आम्ही भावंडे आजीच्या अंगाखांद्यावर खेळून शैशवातून बालपणात आलो. आमचे बालपण मामी व मावशीचे बोट धरून संपन्न झाले. माझे व्यक्तिमत्व घडविणारे जणू हे तीन खांब होते. चौथा खांब माझे आई-वडील त्यांनी माझ्या व्यक्तिमत्त्वाला परिपूर्णता देऊन आकार देण्याचाही प्रयत्न केला. उत्तम संस्कार करून विद्या विनय संस्कार यांनी संपन्न केले. मला सर्वांग सुंदर बनवण्याकरता शास्त्र व कला यांचा सुंदर संगम माझ्यात केला. मी गायन व नृत्य शिकले.

नृत्याच्या बाबतीतला एक अविस्मरणीय प्रसंग व आठवण तुम्हाला सांगते. माझे नृत्य –शाळेतर्फे पहिला वहिला नृत्याचा कार्यक्रम झाला व त्याला प्रथम पारितोषिकाचा मान मिळाला. अध्यक्षांच्या हस्ते बक्षीस घेतले तो क्षण व आईला मारलेली मिठी तो क्षण अविस्मरणीय अजरामर असा आहे.

माझी आईही विद्यार्थीप्रिय अध्यापिका होती. ती माझ्या आयुष्याची बॅकबोन आहे .तिने मला अभ्यास निरनिराळ्या अध्यापन पद्धतीने शिकविला. माझी आई एक प्रतिभावंत लेखिका व कवयित्री आहे .तिच्याच प्रेरणेमुळे माझ्यात लेखनाचा गुण आला असावा .मी नवव्या वर्गात असताना ‘क्रिकेट’ वर व एका अध्यात्मिक विषयावर कविता केली .सर्व लोक अचंबित झाले त्या कविता वाचून.  लेखनाची सवय मला तिच्या motivation मुळे लागली.

माझे बाबा फिनिक्स पक्ष्याप्रमाणे आहेत. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून जीवन कसे जगावे हे त्यांनी शिकवले. माझ्या आई-बाबांनी माझ्यावर उत्तम संस्कार करून उत्तम माणसाची प्रेरणा केली .माझे आई-बाबा  व आजोळ म्हणजे माझ्या संस्काराचे चालतं बोलतं विद्यापीठच जणू ! माझ्या शैक्षणिक बाजूकडे तर त्यांचे लक्ष होते पण मला सोशल बनविण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे.

मी सुद्धा आज उत्तम शिक्षिका आहे अध्यापनाच्या विविध पद्धती मला ज्ञात आहे .माझ्या कर्तव्यात पूर्णपणे मी devoted आहे .हे सर्व माझ्या आईने motivation केले म्हणून शक्य झाले. जणू काही ही सर्व माहेरची मंडळी माझ्या जीवनाचे शिल्पकारच नव्हे का ?

माझ्या माहेरची आठवणींची दृश्य, त्याची चित्रफित माझ्या डोळ्यासमोरुन अखंडपणे जात होती . किती वेळ झाला तरी मी भूतकाळाच्या हिंदोळ्यावर बसून  झोके घेत होती. तेवढ्यात मला माझ्या मुलीची हाक ऐकू आली.  एकदम मी वर्तमानात आले. या सर्व व्यक्ती  व आठवणी हृदयाच्या कुपीत बंदिस्त करून ठेवल्या होत्या, त्यांना आज संधी मिळाली.    

लेखिका :- सौ. रेणुका आशिष ओझरकर (पूर्वाश्रमीची रेणुका वसंत पराडकर )

Mobile no. 9372912230

संग्राहिका –  सौ. विद्या पराडकर

पुणे.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares