मराठी साहित्य – कथा/लघुकथा – ☆ अडगळ ☆ – सौ. सुजाता काळे

सौ. सुजाता काळे

(सौ. सुजाता काळे जी की कथा ‘अडगळ ’ इस भौतिकवादी एवं स्वार्थी संसार की झलक प्रस्तुत करती है। इस मार्मिक एवं भावुक कथा के एक-एक शब्द , एक-एक पंक्तियाँ एवं एक-एक पात्र हमें आज के मानवीय मूल्यों में हो रहे ह्रास का एहसास दिलाते हैं ।यह जीवन की सच्चाई है। क्या  ‘समय’ के साथ ‘संबंध’  भी पुरानी वस्तुओं की तरह ‘कबाड़’ में तब्दील हो जाते हैं?  मैं इस भावनात्मक सच्चाई को कथास्वरूप में रचने के लिए सौ. सुजाता काळे जी की लेखनी को नमन करता हूँ।)

☆ अडगळ ☆

 

काल रात्री आव्वाचा फ़ोन आला. ‘ताई’ म्हणून ओक्साबोक्शी रडायला लागली. मला वाटलं  की आप्पांबरोबर भांडण झालं की काय ? तीच रडणं एकूण मलाही  धक्का  बसला. परवा तिचा एकुलता एक मुलगा सार्थक त्याच्या बायको मुलाबरोबर त्याच्या नवीन घरी राहायला गेला होता. तिचे घर सुने सुने झाले होते. रिकामे झाले होते. तिच्या घरट्यातील पाखरे उडून गेली होती आणि तिचे घर रिकामे झाले होते. म्हातारपणात उतार वय झालेल्या आई बापाला सोडून तो गेला होता. ज्या सार्थकला तिने जीवाचे रान करून, रात्रीचा दिवस करून, हाल अपेष्टा सोसून वाढवलं होत तोच तिचा एकुलता एक लेक या उतार वयात तिला सोडून वेगळं राहायला गेला होता.

नोकरी निमित्त मुलं परगावी – परदेशी राहणं वेगळं आणि एकाच शहरात बारा तेरा वर्षांनंतर आई बाप सोडून राहणं वेगळं, मग कारण काहीही असो ……! त्यात पोरकेपण , परकेपणा आणि एकटेपणाची भावना असते ती मन पोखरायला लागते. तिचं दुःख मला समाजात होत….. मला समाजात होत  की तिला काय सांगायचं  आहे….!!

अशीही तिनं गेली पाच सहा वर्षे घरात मौनच धारण केलं होतं.  ‘ मौनं सर्वार्थ साधनं …..! ‘   सार्थकच्या शिक्षित बायको बरोबर जुनी मॅट्रिक झालेल्या आव्वाचे लहान सहान वाद होतं असत.  संसार म्हटलं की भांड्याला भांड लागायचंच. फक्त काम पुरताच बोलणे चालू होते.  पण आण्णांच्या स्वभावाला औषध नव्हतं. त्यांच्या वयाने अठ्ठ्याहत्तरी पार केली होती तरीही त्यांच्या तापट स्वभावात किंचित हि फरक झाला नव्हता. त्यांची सतत काही ना काही कुरबुर चालू असे. रेशनिंगच्या अन्नावर जगलेल्या आव्वाला सुस्थितीतील दिवसातील ढीगभर अन्न वाया गेलेले आवडत नव्हते. त्यामुळे घरात अधून मधून काही ना काही तक तक असे. आव्वाच्या अबोलाचे एक कारण असे की तिच्या स्वाभिमानी पण तापट मनाला तिच्या मुलाने सुनेसमोर केलेला अपमान सहन होतं नव्हता. गेल्या दहा बारा वर्षात ती हजारदा मला म्हणत असे की ताई तो मला असा बोलला …. तो मला तसा बोलला…. त्याच्या शब्दांनी माझ्या काळजात भोकं पडली आहेत. आणि तिचं काळीज रडताना बघून माझा थरकाप होतं असे. तिला मी खूप वेळा सांगितले की अशी तळ तळ करू नकोस. मलाही तिचं दुःख कळत होतं. एक आईचं दुसऱ्या आईचं हृदय समजू शकत होतं.

मी तिला बऱ्याचदा समजावले की लाखोंचा हिरा तुझ्या पासून दूर होण्यापेक्षा हजारांचे अन्न वाया जाऊ दे. असे असूनही सार्थक नवीन घर घेई पर्यंत गेली दहा बारा वर्षे एकत्र राहिला. त्यानेही गेली कित्येक वर्षे त्रास काढलाच. त्यामागे अनेक कारणे होती …… असो ….. घरातील चारीही माणसे हटवादी व तापट होती. त्यामुळे घराला तडा गेला होता. कधी कधी असं वाटत कि डिग्री घेऊन ज्ञान मिळतंच असे नाही. मनाचा मोठेपणा व समजूतदारपणाही हवा. तो कोणतीही डिग्री देत नाही.

आव्वाला हे माहित होताच की नवे घर घेतलं म्हणजे मुलगा व सून घराबाहेर पडणार. ती मला फोनवर सांगत होती की तिच्या सोन्यासारख्या नाती तिच्यापासून दूर केल्या. माझ्या मनाची तगमग माझ्या लेकाला कधीच कळली नाही. तो गेला तेव्हा मी घरात नव्हते पण शेजारची आक्का सांगत होती की तिने त्याला खूप समजावले की जाऊ नको. मुलींसाठी तरी रहा. दादा पण खूप  रडत होते……. पण त्याने ऐकले नाही.  ती सांगत होती…. रडत होती…. मी पण गळ्यात दाटून आलेला हुंदका गिळला. डोळ्यातून अश्रू ओघळत होते.

मी एक दोनदा सार्थकला समजावण्याचा प्रयत्न केला पण त्याच्या मते आव्वाचंच चुकत होतं.  तीस वर्षे ज्याने आईचं ऐकलं त्याला आज आव्वा चुकीची वाटत होती. ज्या आव्वाची त्याने देवा सारखी पूजा केली होती ती आव्वा आज त्याला चुकीची वाटत होती. तो काहीही एकूण घेण्याच्या मनःस्तिथीत नव्हता. त्यानंतर मी त्याला समजावणे, सांगणे सोडू दिले होते. खर तो आमच्या सर्वांपासून मनाने खूप दूर गेला होता. नात्यामध्ये एक पोकळी निर्माण झाली होती. आता मलाच पोरकं आणि परकं परकं वाटत होतं.

मी कल्पना करू शकत होते की भविष्यात माझा  मुलगा  आला सोडून गेला तर ……  नकोच …. किती भयंकर कल्पना …… !!  हि कल्पना पण सहन होतं नव्हती…….!!  माझ्या अंगावर शहरे उभे राहिले …..!!

मी विचारात गर्क झाले होते . माझा हुंकार न मिळाल्यामुळे आव्वा ‘ताई , ताई .. म्हणून हाक देत राहिली.  मी विचारांच्या तंद्रीतून बाहेर येत म्हटलं , आव्वा मी ऐकत आहे . तू बोल. सगळं  सामान घेऊन गेला का? ‘ तर ती म्हणाली, ‘नाही,  अजून सगळं सामान घेऊन गेला नाही. गरजेचं नेलं आहे. जुनं जुनं सगळं इथंच आहे. नवीन घरात जुन्या वस्तू कशाला? असाही फ्रिज जुना झालाय, टी. व्ही. जुना झालाय, वाशिंग मशीन, मिक्सर जुना झालाय…. सगळं जुनं झालंय…. आम्ही पण जुने झालोय. अडगळीच्या वस्तू आणि आमची ‘अडगळ ‘ इथंच ठेवून गेलाय….. मला तिच्या ‘अडगळ’ म्हणण्याचा मत्यार्थ कळाला.  आव्वा बोलत होती …. रडत होती ….. मी ऐकत होते …. रडत होते …… किती अचूक शब्द प्रयोग केला तिनं ….. म्हातारपण म्हणजे खरंच ‘अडगळ ‘ असते का??

 

© सुजाता काले ✍

पंचगनी, महाराष्ट्र।

9975577684




मराठी साहित्य – मराठी कथा – ☆ समतोल ☆ – श्री कपिल साहेबराव इंदवे

श्री कपिल साहेबराव इंदवे 

 

(युवा एवं उत्कृष्ठ कथाकार, कवि, लेखक श्री कपिल साहेबराव इंदवे जी का एक अपना अलग स्थान है। आपका एक काव्य संग्रह प्रकाशनधीन है। एक युवा लेखक  के रुप  में आप विविध सामाजिक कार्यक्रमों में भाग लेने के अतिरिक्त समय समय पर सामाजिक समस्याओं पर भी अपने स्वतंत्र मत रखने से पीछे नहीं हटते।  हम भविष्य में श्री कपिल जी की और उत्कृष्ट रचनाओं को आप तक पहुंचाने का प्रयास करेंगे। आज प्रस्तुत है  उनकी एक कहानी समतोल ।)

 

☆ समतोल ☆

 

” काय होईल पुढच्या आयुष्यात काही कळत नाहीये यार. कुठली म्हणजे कुठलंही गणित जुळून येत नाहीये.” आदिती राघवला बोलत होती. बाजुला बसलेली रागीणीही गंभीर होऊन एकत होती.

रागीणी आणि राघव तिचे काॅलेजचे मित्र. पण त्यांच्यात एक जिवाभावाचं नातं बनलं होतं. माणसं जोडण्याची  किंवा जोडून ठेवण्यासाठी रक्ताच्या नात्यांची गरज नसते. हे त्यांच नातं गवाही देत होतं. त्यांचा गृपच एकंदर मस्तीखोर आणि अभ्यासूही तेवढाच होता.

काॅलेज सोडून पाच वर्षापेक्षा अधिक काळ होऊनही त्यांची मैत्री घट्ट होती. कोणीही कोणालाही विसरलं नव्हतं. सुरूवातीला एकमेकांच्या घरी येणं जाणं असायचं पण वेळ सरकत गेली तशी काहींची लग्न झाली. तर काहीनी जाॅब मुळे भेटणं बंद केलं. पण फेसबुक, व्हाटसअॅप मुळे सगळे एकमेकांबददल अपडेट होते. काही खास मोक्याच्या वेळी येणं जाणं असायचंच. पण आज तिच्या वाढदिवसाला जास्त मित्र आले नव्हते. आदितीचाही वाढदिवस साजरा करण्याचा काही प्लॅन नव्हता. तिच्या मनात मागच्या काही दिवसापासुन कोणत्यातरी एका कारणावरून घालमेल सुरु होती. खुप विचार करूनही ती कुठल्या एका निर्णयावर पोहोचत नव्हती. नितीनने जेव्हा तिला बर्थडे पार्टीसाठी फोर्स केला तेव्हा ती आधी तयार नव्हती. पण मित्रांना भेटून काहीतरी मार्ग काढावा म्हणुन ती ही तयार झाली. निवांत बोलू म्हणुन तीने शहराबाहेर एक ढाबावर त्यांना नेले. राघवचे मामा तिथेच मॅनेजर होते. मामांनी त्यांना एक टेबल खाली करून दिला. केक कापला गेला. नेहमीच हसत राहणारी आदिती आज नेहमीप्रमाणे हसत नव्हती. चेह-यावर जरी हसू असले तरी डोळ्यांत ते स्मित दिसत नव्हते. हे राघवने कधीच हेरले होते.

केक कापून  झाल्यावर जेवण  मागवून त्यांनी जेवायला सुरुवात केली. आदितीने आपल्या हातातल्या चमचने पहिला घास उचलला. आणि तोंडात टाकायला घेतला. तेवढयात राघव तिला म्हटला. “आदिती, तु काहीतरी डिस्कस करणार होती ना आमच्याशी ?” त्याच्या प्रश्नाने आदिती दचकली. तिचा चमच ओठांजवळच थांबला. तिने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले. त्याने एक घास घेतला आणि म्हटला. ” अगं बघतेयस काय? बोल ना काय म्हणणार होतीस ते”  ती अजुनही गोधळलेली होती. ” पण तुला कसं कळलं” तीने गोंधळून विचारले. राघव- ” बाळं, तु अजुन लहान बाळ आहेस. डोळ्यातले भाव लपवता येत नाही तुला अजुन. नुसतं चेह-यावर हास्य ठेऊन चालतं नाही. ते डोळ्यांतही असु द्यावं लागतं. बोल काय म्हणतेयस” ती आता पुर्णपणे कंफर्ट झाली होती. त्याचं तिला भारी कौतुक वाटलं. ती बोलू लागली ” काय होईल पुढच्या आयुष्यात काही कळत नाहीये यार. कुठली म्हणजे कुठलीही गणित जुळून येत नाहीयेत” ती क्षणभर थांबली. आणि बोलू लागली ” आज वयाची सव्वीस वर्षे पूर्ण झाली. सत्ताविस सुरूही झालं. आई म्हणतेय लग्न करून घे. काही कळत नाहीये. पुरता गोंधळ झालाय माझा.” त्याला तिच्या बोलण्यात गांभीर्य जाणवले. तो म्हटला  “अगं करायचं ना मग लग्न. त्यात काय एवढं विचार करण्यासारखं.”

आदिती मात्र गंभीर होती. ” इतकं सोपं नाहीये माझ्यासाठी ते. तुला माझी परिस्थिती माहीती आहे. बाबा चोवीस तास नशेत असतात. मोठया बहीणीचं लग्न झालंय. श्रध्दा आणि संध्या लहान आहेत अजुन. ते आईला नाही सांभाळू शकणार. भाऊ असता तर त्याच्या भरवशावर एकवेळ सोडलंही असतं. पण देवाने तिच्या नशिबी हे भोग दिलेत. आणि आता मी लग्न करून गेले तर किती मर-मर होईल तीची” बोलता-बोलता तिच्या डोळ्यांत पाणी आलं. रागीणीने तिच्या खादावर सहानुभूतीचा हात ठेवला. राघव ” आदिती बरोबर आहे तुझं म्हणणं. पण काही विशिष्ट गोष्टी विशिष्ट वेळेवर झाल्या कि आयुष्याची घडी व्यवस्थित बसते. लग्नही त्यातलंच एक. ते ही वेळेवर नाही झालं कि खुप सारे अर्थ उलगडत नाहीत. आज ठिक आहे तु यंग आहेस. तर सगळं काही करू शकतेस.  त्यांनाही आणि स्वतःलाही सांभाळू शकतेस. पण आजपासुन यु जर काही वर्षे पुढे गेली ना तेव्हा तुला दिसेल कि तु घेतलेला निर्णय चुक होता कि बरोबर.

मी हे म्हणत नाही कि तु लग्न कर. पण स्वत:ला थोडं पुढे नेवून चल. साधारणतः पंचेचाळीस-शेहेचाळीस वयामध्ये. आई बाबा हयात राहीले तर त्यांच म्हातारपण तुलाच सांभाळायचं आहे. आणि जर समजा नसले तर काय? तु स्वतच्या सामर्थ्यावर जे साम्राज्य उभं केलयस त्याचं काय? सोड साम्राज्याचं. पण हा जो तुझ्या आयुष्याचा वड आहे. त्या वडाला जर पारंबीचं नसेल तर त्याला काही शोभा राहणार का? कोणत्या आधाराने जगशील पुढचं आयुष्य? तुझ्या म्हातारपणाची काठी सांभाळायला तुला हात नकोत? बघ आदिती, माणसाला प्रत्येक परिस्थितीत जगावं लागतं. पण त्या जगण्यालाही काहीतरी कारण लागतं. आणि ते कारण तुला लग्न करूनच भेटतील”

आदिती त्याचं म्हणणं लक्षपूर्वक ऐकत होती. तिला मन मोकळं झाल्यासारखं वाटत होतं. तिने डोळे पुसले. आणि म्हटली ” मग मी काय करायला हवं ?” तिने  त्याला प्रश्न केला. त्याला कदाचित हा प्रश्न अपेक्षितच होता. आणि त्याच्याकडे उत्तर तयारच होते. असे भाव त्याच्या चेह-यावर दिसत होते. ” अगं सोप्प आहे. जो कोणी मुलगा असेल ना त्याला सांग कि तुझी अडचण काय आहे.  तो समजुन घेईल तुला. मग तु तुझ्या आईची काळजीही घेऊ शकतेस. आणि तीला गरज पडली तर तुझा पगारही देऊ शकशील.” आदिती ” कोण भेटेल असा समजुन घेणारा ? तु करशील माझ्याशी लग्न? ” ती सरळ बोलुन गेली. त्यावर रागीणी पुरती दचकली. तिच्या हातातलं चमच खाली पडलं. ती वाट पाहु लागली कि राघवचे उत्तर काय असेल. तो मात्र शांत होता. स्मित हसुन तो बोलला. ” केले असते तुझ्याशी लग्न. तुझ्या सारखी मुलगी भेटायला भाग्य घेऊन जन्मावं लागेल. पण तु मला मित्र कमी आणि भाऊ जास्त मानले आहेस. आणि मी ही बहीणीपेक्षा कमी दर्जा नाही दिला तुला. म्हणुन एका भावाची जबाबदारी म्हणुन तुला हसत ठेवणं माझं कर्तव्य आहे.”

आदिती मात्र स्मित हसली. रागीणीलाही तिचं उत्तर मिळालं होतं. जेवण संपल्यावर त्यानी रागीणीला तिच्या घरी सोडले. आणि आदितीलाही पोहोचवण्यासाठी तिच्या घरापर्यंत गेला. आदिती गाडीतून उतरली. आणि जाऊ लागली. राघवने तिला आवाज दिला ” आदिती ” ती मागे फिरली. ” काळजी करू नकोस. कोणी नाही तर मी आहे सक्षम आईसाठी ” आणि तो निघून गेला. आदिती त्याला स्वाभिमानी नजरेने पाहत राहीली.

 




मराठी साहित्य – मराठी कथा / लघुकथा – ☆अनिश्चितता ☆ – श्री कपिल साहेबराव इंदवे

श्री कपिल साहेबराव इंदवे 

 

(युवा एवं उत्कृष्ठ कथाकार, कवि, लेखक श्री कपिल साहेबराव इंदवे जी का एक अपना अलग स्थान है। आपका एक काव्य संग्रह प्रकाशनधीन है। एक युवा लेखक  के रुप  में आप विविध सामाजिक कार्यक्रमों में भाग लेने के अतिरिक्त समय समय पर सामाजिक समस्याओं पर भी अपने स्वतंत्र मत रखने से पीछे नहीं हटते। हाल ही में आपकी एक मराठी कथा “पबजी” e-abhivyakti में प्रकाशित हो चुकी है। हम भविष्य में श्री कपिल जी की और उत्कृष्ट रचनाओं को आप तक पहुंचाने का प्रयास करेंगे। आज प्रस्तुत है उनकी एक भावुक एवं मार्मिक  मराठी कथा अनिश्चितता।)

 

☆ अनिश्चितता ☆

 

सकाळीच रोहितला जाग आली पण त्याला अंथरूणातुन उठावसं वाटत नव्हतं. रात्रीच्या जारणाने त्याची झोप पुर्ण झाली नव्हती. सवयीमुळे नेहमीच्याच वेळेवर त्याला जाग आली. पण डोळ्यांत झोप मात्र शिल्लक होती. अंग जड-जड वाटत होतं. डोकंही दुखत होतं. रात्री उशिरापर्यंत त्याला एकच विचार भेडसावत होता. कि काय होईल? या एकाप्रश्नाने त्याची झोप उडाली होती. वय  27  झाली होती. घरी बाबांची तब्येत बरी नव्हती. बाबांना दमाचा त्रास आहे. काही दिवसांपूर्वीच डाॅक्टरांनी निदान केलं होतं. बाबा म्हणत होते “मी जिवंत आहे तोवर संसाराला लागुन जा. मी गेल्यानंतर तुला कोणी विचारणार नाही. तो मोठा आहे. त्याचं लग्न झालंय. तो त्याच्या संसारात रमला आहे. तो तुझ्यावर लक्ष देणार नाही. त्यात तुझी आई म्हातारी ती काय करेल.”  बाबांचं म्हणणं जरी भावनिक होतं पण ते योग्य होतं. कारण त्याच्या मोठ्या भावाचं लग्न होऊन चार वर्षंपेक्षा जास्त वेळ झाला होता. लग्नानंतर मोजून दोन महिने राहिला असेल तो. नंतर त्याच्या बायकोला घेऊन बड्या शहरात निघून गेला होता. गेला तो परतला नव्हता. एकंदरीत म्हणायचं झालं तर त्यानं पुन्हा त्यांच्याकडे ढुंकूनही पाहिलं नव्हतं. म्हणुन तो काही करेल ही उमेद बाबांनीही आणि रोहितनेही सोडली होती. जे काही करायचं ते रोहितलाच करायचं होतं. वय झालं म्हणुन बाबांची तब्येत बरी राहत नव्हती. आणि त्यातच दमाचं नादान. म्हणजे पायाखालची जमीन सरकली होती रोहितची. मोठ्या भावाच्या गोड गोड शब्दाना भुलून होतं तेवढं शेतही विकून टाकलं होतं. आणि आता सगळंच आयुष्य उन्हात उभं होतं. ते घरच तेवढं शिल्लक राहिलं होतं. आणि त्या घराची परिस्थिती बदलावी. आणि गेलेलं शेत परत मिळावं म्हणून म्हणुन रोहितने एका अशा जगात उडी घेतली होती जिथं काही निश्चीत नव्हतं. सगळं काही अनिश्चित होतं. ते क्षेत्र असं होतं कि ज्यात आपलं कोणीच नव्हतं. तिथं जायला त्याच्यासाठी दरवाजे बंद होते. खिडकी तेवढी उघडी होती. तो दरवाजा आतुन उघडण्यासाठी तो जिवाचे रान करत होता. घरची गरिबी आणि सुखी भविष्याचे स्वप्न घेऊन तो मुंबईत आला होता.

मुंबई म्हणजे पैसे वाल्यांची. आणि त्याच्याकडे तोच नव्हता. पण येणा-या काळावर आपल्या कौशल्याचा घाव घालून बदलावा. या निर्धाराने तो मुंबईत आला होता. सुरूवातीच्या चार- सहा महिन्यांच्या निराशेनंतर आता कुठेतरी जम बसायला लागला होता. काही अंशी त्याला यशही मिळू लागलं होतं. मुंबईने आता कुठे तरी त्याला आपलंसं करायला सुरूवात केली होती. पण जे काही मिळतं होतं त्यात त्याचं भागत होतं. आणि त्यांतच बाबांच्या आजाराचं निदान होणं. हे त्याला हैराण करून सोडणारं होतं. आता बाबांच्या इलाजासाठी त्याला पैसे हवे होते. ते कुठून नि कसे येणार? आणि आता पुढे काय?

बाबांचं म्हणणं होतं की लग्न कर. आता त्याच्या समोर तिहेरी संकट आलं होतं. हो संकटच म्हणावं लागेल. एक तर गेलेली शेती, लग्न आणि बाबांचा दवाखाना. भावाकडून त्याला अपेक्षा नव्हती. जे काही करायचं ते त्यालाचं करायचं होतं. आणि याच विचारांनी त्याला झोप आली नव्हती.

सकाळी उठला तेव्हा त्याचं डोकं दुखत होतं. शरीर जड-जड वाटत होतं. पण त्याकडे कानाडोळा करून तो अंथरूणातुन उठला. आणि आपल्या नित्याच्या कामाला लागला. तो कामावर जायची तयारी करत होता तेव्हा त्याला घरून फोन आला. ” बाबाना पुन्हा श्वास घ्यायला त्रास होतोय. त्यांना दवाखान्यात दाखल केले आहे. तू लवकर घरी ये.” त्याने फोन ठेवला. आणि कामावर गेला. डोक्यात तोच विचार होता. रोहितने बाॅस कडे पैसे मागितले तेव्हा बाॅस म्हटला. ” अरे, आता तर जाऊन आला तू गावाकडे. आणि मागच्या महिन्यात तूझ्या किती सुट्या आहेत. पगाराची तारीख पण अजुन लांब आहे. कसा देऊ तुला पैसे?” म्हणत बाॅसने नकार दिला. पण थोडी विनवणी केल्यानंतर व त्याची सर्व हकीकत ऐकल्यानंतर बाॅस पैसे द्यायला तयार झाला. पण त्यापूर्वी त्याच्याकडून  मरणाचं काम  करून घेतले. थकलेल्या अवस्थेत तो घरी आला आणि न थांबता लगेच जायला निघाला.

गावी पोहोचल्यावर तो घरी न जाता सरळ दवाखान्यात गेला. डाॅक्टरांना भेटला. डाॅक्टरांशी भेट झाल्यानंतर बाहेर आला. तेव्हा समोर त्याचा भाऊ उभा दिसला. त्याने त्याच्याकडे दुर्लक्ष केले आणि पुढे जाऊ लागला. पण भाऊने त्याला हाक दिली “रोहित” तो मागे वळला. आणि एखाद्या अनोळखी माणसाने माणसाकडे आवाज दिल्यावर जसं उत्तर दिलं जातं. तस त्याने त्याला पाहीले. आईही बाजुलाच दवाखान्यातील खुर्च्यावर बसली होती. “फक्त तुझेच नाही माझेही बाबा आहेत ते. आता यापुढचा इलाज मी करेल त्यांचा” रोहीतने त्याला काही उत्तर दिले नाही. पण बाजुलाच बसलेल्या आईला त्याच्या बोलण्यात त्याचा स्वार्थ वाटला. तीने शांतपणे त्याला उत्तर दिले ” आता काही नाही रं बाबा आमच्याकडे तुला हिस्सा देण्यासाठी. डोकी लापवण्यासाठी तेवढी झोपडी -हायलीय.  जा घेऊन जा ती बी. पण अश्या येळेला नको येऊ बाबा मंधी. एकतर आधीच पोरगं मरतयं माझं” आईच्या या बोलण्याने भावाच्या डोळ्यांत पाणी आलं. रडतच त्याने आईचे पाय धरले. आणि म्हटला ” नाही आये, मी काही घेण्यासाठी नाही आलो. मोठा मुलगा म्हणुन माझी जबाबदारी पार पाडण्यासाठी आलोय. चुकलं माझं, माफ कर मला” त्याच्या विरहाच्या दिवशी रडून-रडून डोळे सुजवून घेतलेली आईच्या डोळ्यांत आता मात्र एक थेंबही दिसत नव्हता. या आधीही त्याने अश्याच भावनिक गोष्टी बोलुन पार भिकेला लावलं होतं. म्हणुन त्याच्यावर विश्वास ठेवणं कठीण होतं. आणि म्हणुन ती गप्प होती. आईने कोणताही प्रतिसाद दिला नाही म्हणुन तो रोहित जवळ गेला. ” रोहित तू तरी सांग ना आईला. बघ ना ती कशी बोलतेय.” रोहितला मात्र त्याच्याबद्दल थोडीशीही तक्रार नव्हती. त्याने एक नजर आईकडे पाहिलं आणि भाऊकडे पाहून म्हटला. ” बाबा अजुन थोडेच दिवस………. ” अर्धवटचं बोलला आणि त्याचा अश्रंचा बांध फुटला. भाऊने त्याला मिठीत घेतले. आणि दोघेही ढसाढसा रडू लागले. दोघा भावांच्या कित्येक वर्षानंतरच्या भेटीने व त्या प्रेमळ मिठीने आईचेही डोळे पाणावले. ती ही निशब्द झाली होती.

 

© कपिल साहेबराव इंदवे

मु पो. मा. मोहीदा त श , ता. शहादा जि. नंदुरबार

मोब. 9168471113




मराठी साहित्य – मराठी कथा / लघुकथा – ☆ पबजी ☆ – श्री कपिल साहेबराव इंदवे 

श्री कपिल साहेबराव इंदवे 

साहित्यिक प्रवास-

उत्कृष्ठ कथाकार, कवि, लेखक म्हणुन लेखकाची ख्याती आहे. विविध सामाजिक कार्यक्रमात सक्रिय सहभाग. पाणीटंचाई, वाढत चाललेली बेरोजगारी, विविध सामाजिक प्रश्न व हल्लीची राजकारणाची स्थिती यावर लेखक आपले स्वतंत्र मत मांडतात. लेखकाने अनेक कथा लिहील्या असुन. त्यांच्या लेखन शैली आणि कविता पाहुन ” *काव्य  स्पंदनी माझी  कविता*” या प्रातिनिधिक  काव्य संग्रहात प्रकाशकांनी त्यांच्या कवितांची दखल घेतली आहे. विविध कवी संमेलन, विद्रोही साहीत्य संमेलन यातुन लेखकांनी कविता सादर करतांना लेखकांनी आपले विचार व्यक्त केले आहेत. येत्या अल्प काळात ते आपला कविता संग्रह प्रकाशित करण्याच्या मार्गावर आहेत.

 

☆ पबजी ☆

 

“अरे मार त्याला मार मार” रोहित जोरात ओरडला. सकाळची वेळ होती. सगळेजण अजुन झोपलेले होते. रोहित पलंगावर तर आई बाबा आणि समिर खाली जमीनीवर झोपले होते. त्याच्या अशा ओरडण्याने  आई बाबा आणि समिरही झोपेतून झटकन उठले. आईचं ह्रदय त्या  आरोळीने हादरलं होतं. ती उठताच त्याच्या जवळ गेली. आणि त्याच्या अंगावरचे पांघरून हळुच काढले.” काय झालं बाळं” अस काळजीपूर्वक विचारले. पण त्याच्या हातात मोबाईल आणि कानात इयरफोन होते. तो पबजी खेळण्यात दंग होता. त्याच्या अंगावरचं पांघरून काढलं म्हणुन तो आईवर चिडला. “अगं आई तुला काय गरज आहे पांघरून काढण्याची. तुला तुझं काम नाही करता येत का?” त्याचं असं रागावून बोलणं पाहुन ती बिचारी मागे झाली. तो आपल्या पबजी खेळण्यात दंग झाला.

झोपमोड झाली म्हणुन समिरही आईवर रागावला. “आई याला सांग हं असं ओरडत जाऊ नको म्हणुन विनाकारण ओरडतो आणि दुस-या लोकांना परेशान करतो” ती बिचारी शांतपणे ऐकत होती. “बस रे झोप आता गुमानं. मोठा आहे तो तुझ्यापेक्षा” बाबांनी त्याला दम भरला.” मोठा आहे तर मग मोठ्यासारखं वागायला लावा ना. कशाला लहान लेकरावाणी ओरडतंय” समिर हळू आवाजात अंगावर गोदडे ओढत म्हटला. त्याचंही बोलणं खरं होतं म्हणुन बाबा काही बोलले नाहीत. त्यांनी आईकडे पाहीले. तिच्याही डोळ्यांत  तक्रार दिसत होती. ती स्वयंपाक घरात चालली गेली.

बाबा उठले आणि तिच्याजवळ गेले. ते जवळ आलेले पाहुन आई म्हटली “अहो तुम्ही त्याला काही म्हणत का नाही. मोठा झालाय तो आता. शिकला नाही तरी काय झाले. काहीतरी चांगल्या कामाधंदयाला लावा ना त्याला. दिवसभर नुसता पबजी खेळत बसतो. आणि तो धाकटा टिकटाॅकवर व्हीडीओ बनवत असतो. कंटाळा आला त्याचा. काय मिळतं त्यांना त्यात  देव जाणे” “मी बोलतो त्याच्याशी. तु काळजी करू नकोस” बाबानी तिला धीर दिला. आणि रुमाल घेउन अंघोळीला चालले गेले. ते अंघोळ करून बाहेर आले. तोपर्यंत चहा बनला होता. ते पलंगावर जाऊन बसले. रोहित अजुनही पबजी खेळत होता. आईने बाबांना चहा दिला. आणि रोहितला म्हटले “रोहित उठ आणि चहा घे लवकर” रोहितने मोबाईल उशावर ठेवला. आणि कंटाळून उठला आणि तसाच आवाजात बोलला “हो आई” आणि उठून ब्रश करायला गेला. आई समिरलाही म्हटली “तुला काय वेगळं आमंत्रण द्यावं लागेल का रे उठ तु पण. दिवसभर मोबाईल मध्ये अडकून राहता. आणि  सकाळी दहा वाजेपर्यंत झोपता.”  असं म्हणुन ती स्वयंपाक घरात गेली. रोहित ब्रश करून आला. आईने त्यालाही चहा दिला. आणि भिंतीजवळ उभी राहीली. बाबा चहा घेत होते. आईने त्यांना डोळ्यांनीच इशारा केला. बाबा तिचा इशारा समजले. आणि चहाचा एक घोट घेत रोहितला म्हटले. “किती दिवस चालणार हे सगळं” रोहितला ते कळलं नाही. “काय” तो उद्गारला. बाबा “रोहित तु आता मोठा झाला आहेस. काही घराची काळजी घेणार आहेस कि नाही. किती दिवस ते मोबाईल मध्ये बोटं खुपसणार आहेस” रोहितला बाबांच्या बोलण्यातला सार कळला. बाबा बोलत होते “तु शिकला तर नाहीच. पण आता एखादं काम बघुन घरखर्चाला मदत करणार आहेस कि नाही. तुझं लग्नही करायचेय पुढे त्यासाठी थोडी बचत नको का करायला. दिवसभर नुसता पबजी, टिकटाॅक काही कळत नाही मला तुमचं. तो लहान आहे तो काय आदर्श घेईल तुझा” रोहितला डिस्टर्ब केलं म्हणुन तो आधीच चिडलेला होता. त्यावर अजुन सकाळी सकाळी रामायण म्हणुन तो अधिकच चिडला.  “काही पण घेऊ दे आदर्श. तो कुठे एकतो माझं काही. काही बोललं तर उलट फिरून बोलतो तो. मला काही सांगू नका आणि हे असं टोमणे मारणं बंद करा.”

बाबांनी पुन्हा त्याला समजावले. “अरे बाबा. तुला टोमणे नाही मारत आहोत. तुला घरची जबाबदारीची जाणीव करून देत आहोत. तो लहान आहे त्याला काय सांगणार मी.” बाबांचा चहा संपला होता. त्यानी हातातला कप बाजूला करत म्हटले. रोहित- “मग मी काही काम शोधत नाहीये का? मी काय रिकामा बसुन आहे. काम मिळत नाही त्याला मी काय करणार?” आणि रागातच त्याने अर्धवट पिलेला चहाचा कप जोरात खाली ठेवला. आणि झपाटयात बाहेर निघुन गेला. बाबा त्याच्या या अगतिक वागण्याकडे बघतच राहिले. ज्यांच्या खांद्यावर जबाबदारीचे ओझे टाकायचे होते. जे हात त्यांना मदतीला हवे होते त्या हातांवर मोबाईलने कधीच कब्जा जमवून घेतला होता. ते पाहून त्यांचे डोळे पाणावले. पण त्यांनी ते कसेबसे लपवले. पण आईच्या नजरेतून सुटले नाहीत. ती ही अधिर होऊन बघत राहिली.

 

© कपिल साहेबराव इंदवे

मु पो. मा. मोहीदा त श , ता. शहादा जि. नंदुरबार

मोब. 9168471113

 

 




मराठी साहित्य – मराठी कथा/लघुकथा – ☆ साहेब…! ☆ श्री सुजित कदम

श्री सुजित कदम

☆ साहेब…! ☆ 

(श्री सुजित कदम जी  की कवितायेँ /आलेख/कथाएँ/लघुकथाएं  अत्यंत मार्मिक एवं भावुक होती हैं। इन सबके कारण हम उन्हें युवा संवेदनशील साहित्यकारों में स्थान देते हैं। उनकी रचनाएँ हमें हमारे सामाजिक परिवेश पर विचार करने हेतु बाध्य करती हैं।)

त्या दिवशी ऑफिस मधलं सारं काम आटपून मी बाहेरच्या चहाच्या गाडीवर येऊन थांबलो महीना आखेर मुळे पाकीटातल्या कमी झालेल्या पैशाची गोळा बेरीज आणि घरी जाताना पुन्हा ट्रेन मध्ये तीच धक्काबुक्की तीच गर्दी डोक्यात प्रश्नांची सरमिसळ चालू असतानाच ,चहाचा एक एक घोट  ट्रेन च्या लढाईवर जाण्यासाठी मला सज्ज करत होता.

चहा संपवून मी चहाचा कप खाली ठेवणार  एवढ्यात ” साहेब ” ही करूण हाक माझ्या कानावर पडली. मी त्या दिशेने पहाताच माझ्या समोर त्या माऊलीने पसरलेला हात मागे घेतला. तिच्या सोबत असणारं तिच लहान लेकरू तिला घट्ट बिलगून उभ राहील होतं. मी तिच्या हातावर रूपाया देण्यासाठी खिशात हात घालणार , एवढ्यात त्या माऊलीने पुन्हा माझ्यासमोर हात पसरला आणि लेकरांबद्दलची सारी माया एकवटून तिनं, “साहेब  ‘पाच रू’ आहेत का ?” म्हणून  विचारलं. खरं सांगायचं तर कुणीही पैशाची मदत मागितल्यावर त्याला कशासाठी म्हणून विचारायचं नाही. जमत असेल तर हो म्हणायचं नाहीतर नाही म्हणायचं असा माझा स्वभाव.  पण मुळात नाही म्हणणं आपल्या स्वभावात बसत नाही. पण त्या दिवशी तिनं पाच रूपये आहेत का विचारताच माझ्या तोंडून कसाकाय तो अचानक  ‘कशासाठी’ हा शब्द बाहेर पडला कदाचित त्या माऊलीच्या चेह-यावर एकवटलेली  तिच्या लेकरांबद्दलची माया बघूनच डोक्यात चाललेल्या प्रश्नांच्या गुंत्यातून वाट काढत तो शब्द ओठांवर आला असावा. तिनेही मग लेकराच्या डोक्यावरून हात फिरवत काहीशा अस्वस्थतेनच उत्तर दिलं  “लेकरांला भूक लागलीय , साहेब ” .मनात विचार केला की पाच रुपयात ह्या लेकराच पोट खरंच भरेल का? आणि त्याचं पोट भरलं तरी त्या मायेच्या भुकेच काय ? तिला भूक लागली नसेल का..? मी काहीच बोलत नाही हे बघून ती दोघं पुढे निघून जात असतानाच मी त्यांना आवाज दिला माघारी  बोलवलं.

चहाच्या गाडीवर कामाला असणा-या गणप्याला सांगून त्या माय लेकराला पोट भर मिसळ पाव खायला द्यायला सांगितलं. त्या माऊलीन माझ्यासमोर हात जोडले अन् म्हटली साहेब एवढं नको फक्त पाच रूपये द्या मी तिला काही न बोलताच दोघांनाही बसायला खुर्ची दिली त्या माऊलीने पुन्हा नकारार्थी मान डोलवली आणि म्हटली इथं नको आम्ही तिथं खाली बसून खातो मी म्हटलं नाही इथेच बसून खायचंय तेव्हा गणप्यानं रागानच त्याच्या समोर मिसळची डीश आणून ठेवली तेव्हा मी ही गणप्याकडं रागाने बघताच गणप्या निघून गेला. दोघा माय लेकरांना खाताना पाहून डोळ्यात पाणी दाटून आलं तिनं लेकरांला करून दिलेल्या पावांच्या तुकड्यां समोर माझ्या मनातले, प्रश्नांचे तुकडे अगदीच शूल्लक वाटू लागले त्या दोघांनीही पोटभर खाऊन हात धूतल्यावर  ती माऊली  पुन्हा माझ्या समोर येऊन उभी राहिली अन् पुन्हा माझ्या समोर हात जोडले अन् म्हटली ” खूप उपकार झालं  , येळेला मदत केली साहेब .” त्या माऊलीने मला साहेब म्हणून हाक मारताच मी म्हटलं साहेब नका म्हणू… मी त्या लेकराच्या डोक्यावरून हात फिरवताच, ते दोघं निघून गेले .

पण मी मात्र त्यांना बराच वेळ पहात उभा राहिलो. साहेब शब्दात  अडकलेला मी  आज गरजवंताला देवता स्वरूप भासलो होतो. मी तसाच  उभा होतो. .  रोज रेल्वे स्टेशन वर गर्दी नसलेल्या ट्रेन ची वाट पहात उभा असतो तसाच……!!

 

© सुजित कदम, पुणे

मोबाइल 7276282626.



मराठी साहित्य – कथा/लघुकथा – ? वृत्ती -निवृत्ती ? – सुश्री प्रभा सोनवणे

सुश्री प्रभा सोनवणे

 

? वृत्ती -निवृत्ती ?

(सुश्री प्रभा सोनवणे जी  हमारी  पीढ़ी की एक वरिष्ठ मराठी साहित्यकार हैं ।  हमें हमारे अस्तित्व से रूबरू कराती हुई वृत्ती -निवृत्ती  जैसी लघुकथा सुश्री प्रभा सोनवणे जी जैसी संवेदनशील लेखिका ही लिख सकती हैं।)

आजही कामवाली  आली नाही. निशा भांडी घासायच्या तयारीला लागली पण बराच वेळ भांडी घासायची मानसिकता होईना, नवरा म्हणाला “शेजा-यांच्या बाईला सांग ना आपलं काम करायला”!

“असं ऐनवेळी कोणी येणार नाही.” असं म्हणत ती भांडी घासायला लागली! कामवाली जे काम वीस मिनीटात करते त्याला पाऊण तास लागला!

हुश्श ऽऽ    करत निशा आराम खुर्चीत बसली. मोबाईल हातात घेतला उगाचच दोन मैत्रिणीं मैत्रिणींना फोन केले, नंतर फेसबुक ओपन केलं…तर समोर नॅन्सी फर्नांडिस  चा फोटो, “people you may know” मधे नॅन्सी फर्नांडिस! तिची कॉलेज मधली मैत्रीण! निशा ला अगदी युरेकाऽऽ युरेकाऽऽ चा आनंद! पन्नास वर्षांनी मैत्रीण फेसबुक वर दिसली! बी.एस.सी. च्या शेवटच्या वर्षी त्या दोघींचं कशावरून तरी बिनसलं होतं. सख्ख्या मैत्रिणी वैरीणी झाल्या!

पण त्या क्षणी निशाला नॅन्सी ची तीव्रतेने आठवण आली.  कॉलेज च्या पहिल्या दिवशीच नॅन्सी भेटलीआणि मैत्री झाली. तीन वर्षे  एकमेकींवाचून चैन पडत नव्हतं. पहाटे  अभ्यासासाठी नॅन्सी चं दार ठोठावलं की, नॅन्सी ची आई म्हणे,

“नॅन्सी म्हणजे “लेझी मेरी” आहे, दहा वेळा उठवलं पण अजून बिछान्यातच आहे!”

नॅन्सी च्या आईच्या हातचा तो मस्त  आल्याचा चहा… आणि  अभ्यास! किती सुंदर  होते ते दिवस….

कुठल्या शाळेत अगदी क्षुल्लक कारणावरून झालेलं भांडण…. एकमेकींपासून किती दूर नेऊन ठेवलं त्या भांडणाने….निशाचे डोळे भरून आले.

तिनं नॅन्सी ची फेसबुक प्रोफाईल पाहिली. ती वसई ला रहात असल्याचं समजलं….निशानं तिला रिक्वेस्ट पाठवली…

पाच सहा दिवस झाले तरी रिक्वेस्ट स्वीकारली गेली नव्हती. निशाचं आडनाव बदललेलं.. पन्नास वर्षात चेहरा मोहरा बराच बदललेला!

नॅन्सी ने ओळखलं नसेल का? की मनात राग आहे  अजून? निशा खुपच बेचैन झाली!

आणि  एक दिवस फ्रेन्ड रिक्वेस्ट स्वीकारल्या चा मेसेज आला. मेसेंजर वर नॅन्सी चे मेसेज ही होते, “कशी आहेस? खुप छान वाटलं तुला फेसबुक वर पाहून! आठ दिवस फेसबुक पाहिलंच नाही!”

मग महिनाभर चॅटींग, फोन  होत राहिले! नॅन्सी चा वसई ला ये…हे आग्रहाचं  आमत्रंण स्वीकारून निशा वसई ला पोचली! थांब्यावर नॅन्सी स्कूटर वर न्यायला आली होती. टिपीकल ख्रिश्चन बायका घालतात  तसा फ्रॉक, पांढ-या केसांचा बॉयकट….दोघी ही सत्तरीच्या  आत बाहेर!

नॅन्सी ची स्कूटर  एका चर्च च्या आवारात येऊन थांबली. बाजूलाच तिचं बैठं घर….मस्त कौलारू …प्रशस्त!

“हे घर माझ्या आजी चं आहे, मला  वारसा हक्काने मिळालेलं!”

नॅन्सी बरीच वर्षे  अमेरिकेत राहिलेली, नवरा, मुलं, सूना, नातवंडं  सगळे  अमेरिकेत!

नॅन्सी ला मातृभूमी चे वेध लागले आणि ती भारतात  आली. वसई तिचं  आजोळ, दोन वर्षांपूर्वी नॅन्सी इथे  आली, अगदी  एकटी….

“तुला एकटीला करमतं इथे?” या निशा च्या प्रश्नावर नॅन्सी हसली,

“आपण एकटेच  असतो गं आयुष्याभर, कुटुंबात राहून  एकटं असण्यापेक्षा, हे एकटेपण आवडतं मला!”

“पण मग वेळ कसा  जातो तुझा?”

“अगं  दिवस कसा जातो कळत नाही. माझी सगळी कामं मीच करते. बाई फक्त डस्टींग आणि झाडूफरशी करायला येते! आधी मीच करत होते, पण ती बाई विचारायला  आली,”

“काही काम  आहे का?”

“ती सकाळी लवकर येऊन काम करून जाते, आम्ही सकाळ चा चहा  आणि ब्रेकफास्ट बरोबर घेतो. खुप गप्पीष्ट आहे ती, लक्ष्मी नाव तिचं!”

मग दिवस भर मी एकटीच…स्वयंपाक, कपडे मशीन ला लावणं, भांडी घासणं, रेडिओ ऐकते, वाचन करते, मोबाईल आणि टीव्ही फारसा पहात नाही. आणि मुख्य म्हणजे मी लोकरीचं विणकाम भरपूर करते, दुपारी चार मुली येतात लोकरीचं वीणकाम शिकायला!

रविवारी  चर्च, गरीबांना मदत करते, माझं एकटेपण मी छान एंजॉय करतेय….

थोडं फार सोशल वर्क…गरीब गरजूंना मदत करते…पैसे आहेत माझ्या कडे आणि माझे खर्च ही फार नाहीत.

विशीत दिसत होती त्यापेक्षा नॅन्सी आता खुप सुंदर दिसत होती. चेह-यावर, व्यक्तिमत्वात जबरदस्त  आत्मविश्वास!

पूर्वी ची झोपाळू, हळूबाई असलेली नॅन्सी खुपच चटपटीत, स्मार्ट झाली होती. तिचा त्या घरातला वावर, व्यवस्थितपणा, वक्तशीरपणा, कामातली तत्परता, कामवाली शी बोलण्याची पद्धत, पटकन केलेला रूचकर स्वयंपाक सारंच विलोभनीय होतं!

चार दिवसांत निशानं  इकडचा चमचा तिकडे केला नाही..म्हणजे नॅन्सी ने तिला तो करू दिला नाही..” तू बस गं, ही माझी रोज ची कामं  आहेत”   असं म्हणत ती घरातली कामं फटाफट उरकत होती.

भरपूर गप्पा…जुनी गाणी ऐकणं…वसई च्या किल्ल्यातली आणि आसपासच्या परिसरातील भटकंती… सारं खुप सुखावह! पन्नास वर्षाचा भला मोठा कालखंड निघून गेला होता. पण या चार दिवसांत त्या कॉलेजमधल्या निशा – नॅन्सी होत्या.

“नॅन्सी किती छान योगायोग आहे  आपल्या भेटीचा! आठवणींना वय नसतं, त्या सदा टवटवीत  असतात…..जशी तू..मी मात्र  आता म्हातारी झाले…आणि म्हणूनच निवृत्त ही!”

“निशा निवृत्ती ला वय नसतं, ते आपण ठरवायचं…जीवन चलने का नाम चलते रहो सुबह शाम ….”

“खुप छान वाटतंय गं, का अशा दूर गेलो आपण? आपल्या भांडणाचं कारण ही किती फालतू……”

“जाऊ दे निशा….नको त्या आठवणी, जर तसं घडलं नसतं तर आज हा आनंद  आपण घेऊ शकलो असतो का? सारी देवबापाची इच्छा!

नॅन्सी ला दोन मुलगे, निशाला दोन मुली सगळे  आपापल्या करिअर मधे, संसारात मश्गुल……

नॅन्सी सारे पाश सोडून इतक्या लांब नव्या  उमेदीने आलेली… वयाच्या अडुसष्टाव्या वर्षी केलेली नवीन सुरूवात…तिच्या वैवाहिक  आयुष्याबद्दल ती फारसं बोलत नव्हती! निशा चा संसार ही फारसा सुखाचा नव्हता, गेली पन्नास वर्षे टिकून होता इतकं च!

निशा जायला निघाली तेव्हा नॅन्सी नं तिला घट्ट मिठी मारली. दोघींच्या डोळ्यात  अश्रू च्या धारा…बाहेर पाऊस….

नॅन्सी ने स्वतः विणलेला बिनबाह्यांचा शुभ्र पांढरा स्वेटर निशा च्या अंगावर चढवला आणि हातात हात गुंफून पाऊस थांबायची वाट पहात बसून राहिल्या…

आता त्या परत कधी परत भेटणार होत्या माहित नाही….

निशा घरी पोचली तेव्हा, नवरा टीव्ही वर रात्री च्या बातम्या पहात होता…तिला पाहून त्याच्या चेह-या वरची रेषा ही हलली नाही.

निशा च्या  आळशी सुखवस्तूपणाची साक्षीदार  असलेली आराम खुर्ची तिची वाटच पहात होती…….

खरंच निवृत्ती ला वय नसतं ती वृत्ती असते निशा स्वतःला च सांग त होती…..

 

© प्रभा सोनवणे,  

“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पुणे – ४११०११

मोबाईल-9270729503

 




मराठी साहित्य – कथा/लघुकथा – ☆ वेळ ☆ – सौ. सुजाता काळे

सौ. सुजाता काळे

☆ वेळ ☆

(सौ. सुजाता काळे जी की कथा ‘वेळ’ इस भौतिकवादी एवं स्वार्थी संसार की झलक प्रस्तुत करती है। इस मार्मिक एवं भावुक कथा के एक-एक शब्द , एक-एक पंक्तियाँ एवं एक-एक पात्र हमें आज के मानवीय मूल्यों में हो रहे ह्रास का एहसास दिलाते हैं ।यह जीवन की सच्चाई है। मैं इस भावनात्मक सच्चाई को कथास्वरूप में रचने के लिए सौ. सुजाता काळे जी की लेखनी को नमन करता हूँ।)

 

त्या दिवशी पहाटेच माईंना धाप लागली. त्यांना श्वास घेण्यास त्रास झाला. एवढया पहाटे दवाखाने बंद ….   काय करावे? मॉर्निंग वॉकला निघालेल्या स्नेही डॉक्टरांनी तपासले. दवाखाना उघाडल्यावर ताबडतोब एडमिट करायवयास सांगितले. माईंच्या सुनेने रेवतीने कसं बसं बळजबरीने  त्यांना चहा बिस्किटे खायला घातली. ते शेवटचे होते असं त्यावेळी तिच्या कल्पनेतही नसणारं…..

सकाळी  दवाखाना उघडल्याबरोबर माईंना दवाखान्यात नेल. डॉक्टरांनी त्यांना एडमिट करून घेतलं. लगबगीनं तपासलं. सगळया तपासण्या झाल्या आणि डॉक्टरांनी माईंची शेवटची स्टेज आहे असं घोषित केलं. रेवतीने डॉक्टरांशीच वाद घातला. काहीही बडबडु नका म्हणाली……  नाडी तपासली तर ठोके खूप कमी.  बी.पी. कमी….. 80–52. ….. तो नंतर कमी कमीच होत गेला….. आधीच त्यांना लो बी.पी.  चा त्रास. डॉक्टर म्हणाले की किडनी फेल आहे. रक्त चढवावं लागेल. प्लाज्मा पण दयावा लागेल. धावाधाव सुरू झाली होती….. नाईलाज ….. त्यांना श्वास घ्यायला त्रास होत होता म्हणुन वेंटिलेटर लावले. कोण जाणे त्यावेळी रेवतीला वेंटिलेटर जणु देवचं भासला. तिच्या मते वेंटिलेटर वर ठेवलं म्हणजे माई नक्कीच वाचणारं. आशा सोडली नव्हती…..

गेल्या दोन – तीन  वर्षांत माईंच्या पोटात पाणी होत  होते.  त्यांच्या मुलीने व डॉक्टर जावयाने मोठया दवाखान्यात नेवून खूप वेळा उपचार केले.  पण वय साथ देत नव्हते. त्यात आप्पा गेल्यापासून त्या शरीराबरोवर मनानेही खचल्या होत्या. गेली बारा पंधरा वर्षे त्यांनी सोरायसिस सारखं असाध्य दुखण सोसलं होतं। त्यात संधीवाताचा त्रास . हालता चालता नीट येत नव्हते. आयुष्यभराच्या काबाड कष्टाचा आवाज आता चलता चालता हाडांतून येत होता. तितक्यात डॉक्टरांनी “नातेवाईकांना बोलावून घ्या” असे सांगितले. माईंच्या धाकटा लेकानं ‘हाय’खाल्ली. त्याला रडु आवरेना. काय कराव सुचेना पण कळवावं तर लागणार होतं. माईंच्या मुलीला कळवलं. तर मुलगी व जावई लगेचच निघाले. खरचं मुलीची माया जगवेगळी असते.  दोन अडीच तासात दोघेही हजर. माई नेहमी म्हणायच्या की डॉक्टर  भुंग्यासारखी गाडी चालवतात…..

डॉक्टरांनी येऊन रिपोर्ट पाहीले. त्यांना कळुन चुकले  की आता माई काही वाचणार नाहीत.

पण माईंचा जीव कुठेतरी दुसरीकदेच अदकला होता. त्यांच्या दादामधे, “दादा” त्यांचा मोठा मुलगा. तो वयाच्या तेराव्या वर्षी शिक्षणासाठी घराबाहेर गावाबाहेर पडला. तो पुन्हा कधीच घरचा झालाच  नाही. खरं तर शिक्षणासाठी गेलेली मुले क्वचितच खेडयात माघारी येतात किंवा बहुधा पाहुणा म्हणुनच घरी येतात. माईंचा मुलगाही गेला तो परगावचाच झाला. त्याचे शिक्षण, नोकरी, लग्न, मुले सगळं काही शहरातच झालं. माई पूर्वी कधी कधी वर्षा दोन वर्षातून त्याच्याकडे जायच्या. नंतर नंतर तेही बंद झालं. शहरी संस्कृती बरोबर गावची संस्कृतीचं पटत नाही हे त्यांना कळुन चुकले होते. माईंचे यजमान आप्पा त्यांच्या भावा बहीणीच्या जबाबदारीचे आझे पेलता पेलताच गेले. त्यामुळे स्वतःच्या संसाराकडे व मुलांकडे त्यांचे दुर्लक्ष झाले. आणि माईंच्या मनात कायमचा खेद राहिला की त्यांच्या मुलगा त्यांच्यापासून कायमचा दूर गेला.  त्या नहेमी त्यांच्या मैत्रिणींबरोबर बोलत असत की एकदा माझ्या तावडीत येऊ दे गं….  मला त्याच्याशी मन भरून गप्पा मारायच्या आहेत. जो गेला तो गेलाच.  एकदा माझ्या तावडीत सापडू दे. नेहमी आला की लगेच निघुन जातो. राहातचं नाही.  असे म्हणत म्हणत चाळीस वर्षे निघून गेली. आणि माईंना  त्यांच्या मनातले काही बोलता आलेच नाही. त्या आयुष्यभर झुरतच राहील्या . नंतर नंतर त्रागा करू लागल्या की “आता मला त्यांचे तोंड देखील पहायचे नाही. माझ्यासाठी त्याच्याकडे वेळ नाही. त्याला म्हणावं की मी मेल्यानंतरही येऊ नकोस. मला अग्नी पण देऊ नकोस. एक दोनदा तर दादांना फोन वर बोलतनाही अश्याच रागावल्या.

माणसाचं काय असतं ….. हे कधी कधी कळतचं नाही. जे हाती नसतचं त्याचा हव्यास असतो.

बरे असो …..अश्या माईंच्या ‘साहेब झालेल्या मोठया मुलाला रेवतीने फोन केला व म्हणाली ¸ “ दादा माईंची तब्येत खूप गंभीर आहे. त्यांना दवाखान्यात अ‍ॅडमिट केलं आहे. डॉक्टरांनी नातेवाईंकांना बोलवून घ्यायला सांगितले आहे. पण….. दांदानी नेहमीसारखी यावेळीही येण्यासाठी अनिच्छा दाखवली. “मला वेळ नाही. खूप अर्जंट कामे करायची बाकी आहेत. उदया आले तर नाही का चालणार?” रेवती म्हणाली की दादा डॉक्टरांनी लास्ट स्टेज सांगितली आहे. मी माझे सांगायचे काम केले. तुम्ही काय ते ठरवा. असे म्हणत रेवतीने फोन ठेवला. मी विचार केला की सोश्यल मीडियाने माणसांना जोडल आहे की तोडल आहे. पूर्वी लग्न पत्रिका महिना महिना आधी लोकं पाठवत असतं. नातेवाईक कार्यक्रमास हजर होत. पण मृत्यु पावलेल्यांच्या बातमीचे पत्र सर्व विधि उरकले तरीही मिळत नसे. पण आता तर तस नाही…..

तर काय….. माईंच्या दादांना कळवण्याचे कर्तव्य रेवतीने केले. आता ‘वेळ’दादांची होती कर्तव्य पार पाडण्याची. त्यादिवशी संध्याकाळ होत आली तरी माईंची तब्येत काही स्थिर होत नव्हती.  रेवती व विभाताई दिवसभर माईंजवळचं होत्या. दिवसभरात माईनी अनेकवेळा दादाबद्दल विचारलं. सकाळी बोलत होत्या तोपर्यंत बोलल्या नंतर इशा–याने विचारू लागल्या. त्या दोघी काय बोलणार.  त्यांच्याकडे त्यांच्या प्रश्नाचे उत्तर नव्हते. त्यांना या क्षणीही त्यांच्या दादाशी बोलायचे होते. मनातलं साठवलेलं सगळं बोलायचं होत. राग, प्रेम ब झुरणारा झरा वाहु दयायचा होता.  पण हळुहळु त्यांची स्थिती खालावून गेली. शरीरातील एक एक अंग काम करेनासा झाला. संध्याकाळी ब्लड प्रेशर अगदी लो झाला. आता त्यानां खाणाखुणा पण करता येत नव्हत्या. वाचेने साथ सोडली होती…. त्राण नहता….. तोंडावर लावलेले वेंटीलेटर काढ म्हणुन त्यांनी रेवतीला वारंवार सांगितले. पण तिच्या हातात काही नव्हते. त्यांना रक्ताच्या बाटल्या व प्लाज्मा देऊन काही उपयोग झाला नव्हता. देवाची प्रार्थना करण्याशिवाय दूसरा पर्याय नव्हता.

आणि……….संध्याकाळी माईंचा दादा आला.  आल्या आल्या माईंची चौकशी केली व आय सी यू मधे भेटायला गेला. माईंना हाक मारली. आम्ही सगळे खुष होतो की माईंना आनंद होईल. पण….. हे काय  माईंनी चक्क मानच फिरवली. दादांचा चेहराही पाहीला नाही. आम्हा सगळयांना आश्चर्य वाटले की हीच ती माई आहे का? जी आयुष्यभर दादाशी पोटभर बोलायचं म्हणत होती. आज काय झालयं? दादांनी तीन चार वेळा हाक मारली. पण माईंनी फिरवलेली मान पुन्हा वळवली नाही. आज काय झालयं माईला?

कारण वेगळचं होतं….. त्यावेळी माईंकडे वेळ होता पण दादाकडे नव्हता. आज माई मरणाच्या दारात आहे आणि दादा दवाखान्याच्या दारात….. आज दादाकडे वेळ आहे पण माईंकडे नाही. मी समजू शकले की माईंना वाटले असेल की अंतिम क्षणी भेटायला आला आहे जेव्हा बोलणचं अशक्य होतं. आता त्या बोलण्याच्या स्थितित नव्हत्या.

पहाटे पहाटे माई गेल्या….. त्यांचे अंत्यसंस्कार झाले. अग्नि देताना वर्षांवर्षींचा दादाचा उमाळा दाटून आला….. दादाने हबंरडा फोडला….. माई….. माई तू माझ्याकडे एक वेळ पाहीलं नाहीस….. एक वेळ…..फक्त एक वेळ …..पण त्यांना कुठे माहित होतं की माईंची ती ‘वेळ….. आता टळून गेली होती…..!!!

© सुजाता काले ✍

पंचगनी, महाराष्ट्र।

9975577684




मराठी साहित्य – मराठी कथा/लघुकथा – ☆ शिकवण ☆ श्री सुजित कदम

श्री सुजित कदम

☆ शिकवण ☆ 

(श्री सुजित कदम जी  की कवितायेँ /आलेख/कथाएँ/लघुकथाएं  अत्यंत मार्मिक एवं भावुक होती हैं। इन सबके कारण हम उन्हें युवा संवेदनशील साहित्यकारों में स्थान देते हैं। उनकी रचनाएँ हमें हमारे सामाजिक परिवेश पर विचार करने हेतु बाध्य करती हैं।)

 

काल खूप वर्षांनंतर एक ओळखीचे काका भेटले,  मस्त गप्पा मारल्या…!

मला म्हटले ,”काय करतोस..?” मी म्हटलं…”.छोटसं दुकान आहे…”

मी काही बोलायच्या आधीच.. त्यांनी बोलायला सुरुवात केली..;

”ह्या सोसायटीत माझा मोठा फ्लॅट आहे..,

घरात धुणं भाड्यांला कामवाली आहे..,

फोर व्हिलर ही आहे..; पण ह्या वयात चालवायला भिती वाटते, आम्ही दोघंच असतो बघ इथे रहायला…!

पेन्शन मध्ये जेवढं भागवता येईल तेवढं भागवतो .

मोठा मुलगा अमेरिकेत असतो…

दुसरा मुलगा ईथे जवळजच राहतो …,

दोघांनाही त्यांच्या मनासारखं शिकवलं..

आता  ते दोघेही *वेल सेटल* आहेत…”

काका  मनसोक्त बोलत होते मी ऐकत होतो…,

”वर्षां दोन वर्षांनी मोठा अमेरिकेतून मुलगा येतो भेटायला.. काही दिवस राहतो.. त्याची इथली कामे झाली की विचारतो,  ” किती पैसे देऊ? ”

”बेटा पैसाच आता  आमच्यातला दुरावा बनत चाललाय बघ.  आमच्या गरजा आता भावनिक  आहेत. ”

”दुसरा मुलगा खूपच बिझी असतो त्याला तर अजिबात वेळ मिळत नाही…  मीच दिवसभर एखादी चक्कर मारतो त्याच्याकडे..!”

“मुलं मोठी झाल्यावर… थोडं आपणच समजून घ्यायला हवं..आपणच..,मुलांना आभाळ मोकळं करून दिलंय किती उंच उडायचय हे त्यांच त्यांनी ठरवायचं….;फक्त उडताना त्यांनी घरचा रस्ता विसरू नये एवढंच…!”

“बरं माझ सोड …

तू सांग तूझ कस चाललय …?

मी म्हटलं..” छान चाललयं….”

“दोन मुलं आहेत… लहान आहेत अजून..”

यावर ते म्हणाले  , “वाह… छान..

त्यांना ही आभाळ मोकळ करून दे…!

तुझ्या मुलांना ते म्हणतील ते सारं काही दे पण दुसर्‍या साठी वेळ द्यायचा  असतो हे देखील शिकवता  आलं तर जरूर शिकव या नव्या पिढीला. . . !

तुझ्या  लेकरांना दैदीप्यमान भरारी घेण्यासाठी दशदिशा खुल्या करून दे  पण त्यांना घरी परतण्यासाठी रस्ता मात्र एकच ठेव…;

पुस्तके वाचायला शाळेत शिकतीलच . . पण या दुनियेत जगण्यासाठी माणसं वाचायला शिकव.  म्हातारपणी  आधार हवा  असतो बेटा. . डेबिट कार्ड नको  असतं . . आपल माणूस  आपल्या शिलकीत पाहिजे. . . यशोकीर्तीच्या घडणावणीत आपल लेकरू आपल रहात नाही आणि मग सुरु होतं वाट पहाणं.

तुझ्या मुलांना पैसा कमवायला  आणि प्रेम वाटायला शिकव म्हणजे मग माझ्यासारखी तुला वाट पहावी लागणार नाही…! ”

 

© सुजित कदम, पुणे

मोबाइल 7276282626.



मराठी साहित्य – मराठी कथा – *अपुरे घरटे* – श्रीमती रंजना मधुकरराव लसणे 

श्रीमती रंजना मधुकरराव लसणे 

*अपुरे घरटे*

(इस अत्यंत शिक्षाप्रद एवं हृदयस्पर्शी लघुकथा के लिए  श्रीमति रंजना जी की लेखनी को सादर नमन)

सकाळची वेळ होती कोवळे ऊन पडलेले होते. सर्वत्र उत्साहाचे वातावरण होतं.

आज मंगळवार  बाजारचा दिवस असल्यामुळे मजूर लोकांना कामाला सुट्टी होती. ओळखीचे  एकजण सुट्टीच्या दिवाशी “काही काम आहे का ताई” विचारायला आले . काय काम सांगावे हा विचार करत असतानाच, घराच्या दोन्ही बाजूला बाभळीच्या फांद्या मधे डोकावणाऱ्या फांद्या दिसल्या.  येताजाता त्यांचे काटे अंगाला टोचत असत. ” मामा याच्या मधे आलेल्या फांद्या कट कराल का?”  “हो करतो की ताई” असे म्हणून ते कुऱ्हाड आणायला निघून गेले आणि मी शाळेला गेले.

चार वाजता येऊन पाहिले आणि  त्याला फांद्या तोडायला सांगून अक्षम्य अपराध केल्यासारखे वाटायला लागले .

कारण डेरेदार वाढलेल्या बाबळीच्या प्रत्येक फांदीवर सुगरणींचे अनेक घरटे जवळजवळ शेवटच्या टप्प्यावर आलेले होते जवळपास एक महिन्याच्या अथक प्रयत्नांची पराकाष्ठा करून ते बिचारे जीव घरटे तयार करत होते.

मुख्य म्हाणजे पोर्च मधे बसून त्यांची कारागीरी पाहणे हा माझ्यासाठी आवडता छंदच बणलेला होता. काडी काडी जमवून घरटे तयार करणारे सुगरण पक्षी पाहून एक नवीन चैतन्य मनात संचारत असे, परंतु मात्र मन पुरतं कोलमडून गेलं होतं. या नराधमाने त्या बाभळीच्या  सर्वच्या सर्व  फांद्या तोडून त्यावरील घरटे मुलांना खेळायला देऊन टाकले होते. या माणसाचं काय करावं तेच कळत नव्हतं

जातायेता टोचणाऱ्या  काट्यां पेक्षा शेजारच्या झाडावरून पाहणाऱ्या दहाबारा सुगरणींच्या नजरा आज मला जास्तच टोचत होत्या.

आपण याला फांद्या तोडायला सांगून फार मोठा गुन्हा केला आहे असं सतत जाणवत होतं.  पुढचे दोन दिवस पक्षांची हालत पाहावी वाटतच नव्हती. परंतु नंतर मात्र ते सारे नवीन घरट्याच्या तयारीला लागले. परंतु आजही झाडाकडे पाहिले की ते अपुरे घरटे चटका लावून जाते.

तात्पर्य :- काम करणाऱ्याची वैचारिक कुवत लक्षात न घेता इतरांना गृहीत धरून काम सांगितले की असे अनर्थ ओढावतात, मग पश्चात्ताप करूनही काहीच उपयोग नसतो. त्यामुळे संभाव्य धोके लक्षात  घेऊन स्पष्ट सुचना देणे फार महत्वाचे असते.

 

© श्रीमती रंजना मधुकरराव लसणे 

आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली

9960128105

 

 




मराठी साहित्य – कथा/लघुकथा – घरटं  – श्री सदानंद आंबेकर

श्री सदानंद आंबेकर 

 

 

 

 

 

घरटं 

श्री सदानंद आंबेकर जी की हिन्दी एवं मराठी साहित्य लेखन में विशेष अभिरुचि है।  गायत्री तीर्थ  शांतिकुंज, हरिद्वार के निर्मल गंगा जन अभियान के अंतर्गत गंगा स्वच्छता जन-जागरण हेतु गंगा तट पर 2013 से  निरंतर प्रवास

कल आपने श्री सुजित  कदम  जी  का  मराठी आलेख * घराचे घरपण * पढ़ा। आखिर चिड़िया का घोंसला भी तो घर ही है

इसी क्रम में हम श्री सदानंद आंबेकर जी  के आभारी हैं इस मराठी  लघुकथा  – “घरटं के लिए जो कि उनके जीवन के ही एक प्रसंग से प्रेरित है। )

शहरातील प्रसिद्ध समाजसेवक, अनेक धर्मार्थ संस्थांचे प्रमुख आणि नामवंत बिल्डर, डॉ प्रताप आपल्या बालकनी मधे त्यांच्या धर्मपत्नी सह बसून सकाळच्या चहा चा आनन्द घेत होते। देशकाळाची चर्चा होत असतांना अचानक प्रताप चे लक्ष बालकनी मधे ठेवलेल्या उंची लाकडी रॅक कडे गेले, त्यात सर्वात वरच्या कप्यावर दोन सुरेख लहानगे पक्षी येर-झार करीत होते। लक्ष देऊन पाहिले तर कळले कि ते वारंवार येत-जात, वाळके गवत, कापूस, पंख इत्यादि वस्तु आणून तिथे आपले एक घरटं बनवून राहिले आहेत। बायकोला  ती गोष्ट दाखविली तर तिच्या तोंडून सहजपणे निघाले – ‘अय्या, किती सुंदर घरटं बनवून राहिले आहेत ते, कित्ती मज्जा येईल जेव्हां लहान-लहान पिले चीव-चीव करतील ते . . . .’

हे ऐकतांच प्रतापराव लगेच बोलले- ‘हे कसलं सुंदर, यानी तर घरांत कचरांच व्हायचा आणि कसलं ते चीव-चीव म्हणे, उगांच नसला तो कल्ला व्हायचा। छे छे, हा त्रास आत्ताच लांब करायला हवा। तू नोकराला सांग कि ही घाण आत्ताच्या आत्ता इथून फेक।’

यावर त्यांच्या सौ उत्तरल्या – ‘अहो, यांत काय नुकसान होतंय आपलं ? न ते बिचारे तुम्हांला सीमेंट-वाळू मागतांत न तंर तुमच्या प्लॉट चा हक्कं, मग त्यात कसंला त्रास तो? अहो, तुम्हीं पण तर शहराभरांत कुठेहि इमारती उभ्या करता नां, मग या बिचारयांना कां म्हणून हाकलावे? त्या शिवाय तुम्हीं तर गोर-गरीबांना मदतीचे कामं पण करता नं?’

बायकोचे  उत्तर ऐकून लगेच उठून प्रतावरावांनी लांब दंडा हातांत घेतला नि त्या चिमुकल्या पक्ष्यांचं ते घरटं उधळलं आणि बायको कडे पहांत बोलले- ‘अगं तू पण एकदम भाबडीच, आपल्या या बंगल्याची ब्यूटी खराब व्हायची आणि या घरट्याने आपल्याला काय तरी प्रॉफिट मिळणार??’

प्रतापरावांची पत्नी त्यांच्या कडे न समजणार्या नजरेनी नुसती बघत राहून गेली।

©  सदानंद आंबेकर