मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ म्हणून मी नेहमी आनंदात असतो ☆ प्रस्तुती – श्री रवी साठे

? वाचताना वेचलेले ?

☆ म्हणून मी नेहमी आनंदात असतो ☆ प्रस्तुती – श्री रवी साठे ☆ 

मी भूतकाळ चघळत नाही

मी भविष्याची चिंता करत नाही नियोजन करतो

मी वर्तमानात जगतो

म्हणून मी नेहमी आनंदी असतो ☺️

 

मी कुणाकडुन काडीची अपेक्षा करत नाही,

मी कुणाबद्दल राग मनात धरत नाही,

मी लगेच सगळ्यांना माफ करतो,

म्हणून मी नेहमी आनंदी असतो. ☺️

 

मी हायफाय राहण्यासाठी धडपडत नाही,

आपुलकीची आणि मैत्रीची किंमत नसणाऱ्यासाठी कधीच दुःखाने तडफडत नाही,

साधं राहून आपल्या माणसांत सुखानं रमतो,

म्हणून मी नेहमी आनंदी असतो. ☺️

 

कोण काय बोलतं ह्याचा मी कधीच विचार करत नाही,

कोणी काहीही बोलल तरी पुन्हा मी ते स्मरत नाही,

माझे जीवन स्वछंदी आहे, ते मी मजेत जगतो,

म्हणून मी नेहमी आनंदी असतो. ☺️

 

मला ना पदाचा ना ज्ञानाचा अहंकार, 

तुच्छतेचा विचार कधी मनाला  नाही भावला,

पाय जमिनीवर ठेवून,  प्रसंगी अनवाणी चालतो, 

म्हणून मी नेहमी आनंदी असतो. ☺️

 

जगायला काहीच भौतिक सुख लागत नाही,

म्हणून मी गर्वाने कधीच वागत नाही,

सगळ्यांशी प्रेमाने आदराने आपुलकीने वागतो,

म्हणून मी नेहमी आनंदी असतो. ☺️

 

जन्म शाश्वत आहे तसा मृत्यू देखील शाश्वत आहे, ही जाणीव आहे, 

माझ्यातही दोष आहेत आणि काहीतरी नक्कीच उणीव आहे,

माझे दोष मी रोजच पाहून सुधारण्याचा प्रयत्न करतो,

म्हणून मी नेहमी आनंदी असतो.

                      

 आपले आनंदी रहाणे हाच आपल्या निरोगी जीवनाचा  मूलमंत्र आहे” ?

प्रस्तुती – श्री रवी साठे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ कशास मागू देवाला? ☆ संग्राहक – श्री सुहास सोहोनी

श्री सुहास सोहोनी

? वाचताना वेचलेले ?

☆ कशास मागू देवाला? ☆ संग्राहक – श्री सुहास सोहोनी ☆ 

क्षणो क्षणी तो देतो मजला हृदया मधुनी श्वास नवे..

कशास मागू देवाला, मज हेच हवे अन् तेच हवे?

 

क्षितिजावरती तेज रवीचे रोज ओततो प्राण नवे..

उजळविती बघ यामिनीस त्या नक्षत्रांचे लक्ष दिवें…

निळ्या नभावर रांगोळीसम उडती चंचल पक्षि-थवें…

कशास मागू देवाला, मज हेच हवे अन् तेच हवे?

 

वेलींवरती फुलें उमलती रोज लेउनी रंग नवे…

वृक्ष बहरती, फळें लगडती गंध घेउनी नवे नवे…

हरिततृणांच्या गालीच्यावर दवबिंदूंचे हास्य नवे…

कशास मागू देवाला, मज हेच हवे अन् तेच हवे?

 

डोळयांमधली जाग देतसे नव-दिवसाचे भान नवे..

अमृतभरल्या जीवनातले मनी उगवती भाव नवे…

प्रसन्न होउन निद्रादेवी स्वप्न रंगवी नवे नवे …

कशास मागू देवाला, मज हेच हवे अन् तेच हवे?

 

कोण आप्त तर कोणी परका उगा निरर्थक मन धावे..

सखा जिवाचा तोच, हरी रे, नाम तयाचे नित ध्यावे…

नको अपेक्षा, नकोच चिंता, स्वानंदाचे सूत्र नवे…

कशास मागू देवाला, मज हेच हवे अन् तेच हवे?

जय गजानन, गण गण गणात बोते,

संग्राहक : सुहास सोहोनी 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ अप्रूप पाखरे – 17 – रवींद्रनाथ टैगोर ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ अप्रूप पाखरे – 17 – रवींद्रनाथ टैगोर ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ 

[८५]

जळणार्‍या ओंडक्याची

धडधडती ज्वाळा बनली.

’हा माझा फुलण्याचा क्षण

आणि हाच मृत्यूचाही…’

 

[८६]

तुझा साधेपणा पोरी

किती आरस्पानी

निळ्याशार तळ्यासारखा

तुझ्या सच्चेपणाचा तळ

स्वच्छ दाखवणारा.

 

[८७]

तुझ्या दिवसाची गाणी

गात गातच तर इथवर आलो.

आता या कातर सांजवेळी

वादळ घोंगावणार्‍या

या भयद रस्त्यावर

वाहू देशील का मला

तुझाच दीप

 

[८८]

दुनियेचं काळीज

पुरं वेढलस तू

दाईते,

आपल्या आसवानं

जसं

समुद्रानं पृथ्वीला

कवळून असावं

 

मूळ रचना – स्व. रविंद्रनाथ टैगोर 

मराठी अनुवाद – रेणू देशपांडे (माधुरी द्रवीड)

प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ आयुष्याचे गणित ☆ प्रस्तुति – कालिंदी नवाथे

? वाचताना वेचलेले ?

☆ आयुष्याचे गणित ☆ प्रस्तुति – कालिंदी नवाथे ☆ 

आयुष्याचे गणित चुकले असे कधीच म्हणू नये.

आयुष्याचे गणित कधीच चुकत नसते, चुकतो तो चिन्हांचा वापर.

बेरीज,वजाबाकी, गुणाकार,भागाकार ही चिन्हं योग्य पद्धतीने वापरली  की  उत्तर मनासारखे येते.

आयुष्यात कुणाशी बेरीज करायची, कुणाला केंव्हा वजा करायचे, कधी कुणाशी गुणाकार करायचा आणि भागाकार करताना  स्वतः व्यतिरिक्त किती लोकांना सोबत घ्यायचे हे समजले की उत्तर मना-जोगते येते.

आणि हो,  मुख्य म्हणजे जवळचे नातेवाईक, मित्र, आप्तेष्ट यांचा हातचा एक समजू नये, त्यांना कंसात घ्यावे ! कंस सोडविण्याची हातोटी असली की गणित कधीच चुकत नाही.

प्रस्तुति –  कालिंदी नवाथे 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ व्यक्त – अव्यक्त….वैशाली ☆ संग्रहिका: श्रीमती मीनाक्षी सरदेसाई

श्रीमती मीनाक्षी सरदेसाई 

? वाचताना वेचलेले ?

☆ व्यक्त – अव्यक्त….वैशाली ☆ संग्रहिका: श्रीमती मीनाक्षी सरदेसाई ☆

मनुष्य आणि इतर प्राणी यांच्यामधील महत्वाचा फरक म्हणजे, शब्दांनी समृध्द मनुष्य शब्दांद्वारा आणि शब्दांशिवायही  आपल्या भावना व्यक्त करु शकतो. अव्यक्त राहूनही  परस्परांना समजून घेणारं  नातं खूप छान फुलतं—शब्दांचे खतपाणी घालण्याची फार गरजच नसते.

पण सतत असं राहून चालणार नाही. काही विशिष्ट प्रसंगातच हे योग्य ठरतं.

एरवी वेळोवेळी व्यक्त होणं खूप आवश्यक—नाहीतर मग संवाद संपू शकतो. आणि कुठेतरी गैरसमजाचे बीज नकळतं रोवल्या जातं. 

व्यक्त होणा-यांचे ही वेगवेगळे प्रकार असतात. कोणी स्वतःबद्दल काहीच सांगू इच्छीत नसतं—व्यक्तच होत नाही.  तर कोणी सतत व्यक्त होत राहतं.—या दोन्ही परिस्थितीमध्ये हवा तसा संवाद शक्यच होत नाही.

संतुलीतपणे व्यक्त होणं ही एक कलाच आहे. कुठे केव्हा किती बोलावं, व्यक्त व्हावं, हे कळणं खूप आवश्यक—-

याचबरोबर व्यक्त कोणासमोर व्हायचं,  हे देखील तितकंच महत्वाचं —समोरची व्यक्ती कुठलेही मत न लादणारी, पूर्वग्रह न ठेवता,  निरपेक्षपणे ऐकणारी हवी. व्यक्त होणा-याबरोबरच ऐकणाराही प्रगल्भ हवा. तेव्हाच एखाद्या कठीण प्रश्नातून बाहेर पडण्याचं  सामर्थ्य मिळतं.

व्यक्त अव्यक्त दोहोंमधुन असावा संवाद— 

प्रत्येक नात्यामधील मिटेल मग वाद—-

——वैशाली

संग्रहिका:  श्रीमती मीनाक्षी सरदेसाई

सांगली

मो. – 8806955070

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ वैद्यानां शारदी माता – वैद्य अश्विन सावंत ☆ संग्रहिका – श्रीमती अनिता जयंत खाडीलकर

श्रीमती अनिता जयंत खाडीलकर

? वाचताना वेचलेले ?

☆ वैद्यानां शारदी माता – वैद्य अश्विन सावंत ☆ संग्रहिका – श्रीमती अनिता जयंत खाडीलकर☆ 

या सूत्राचा अर्थ असा की वैद्यांसाठी शरद ऋतु हा  मातेप्रमाणे असतो. शरद ऋतुमध्ये (म्हणजे  ऑक्टोबर हिटच्या उष्म्याच्या   दिवसांमध्ये)  रोगराई एवढ्या मोठ्या प्रमाणात बळावते की त्यामुळे वैद्य-डॉक्टर मंडळींसाठी तो सुगीचा काळ ठरतो.

वर्षाऋतुनंतर येणारा शरद ऋतु म्हणजे पावसाळ्यातील शीत-आर्द्र (थंड-ओलसर) वातावरणानंतर येणारा उष्ण-दमट वातावरणाचा उन्हाळा. बरं, वातावरणात होणारा हा बदल हळूहळू झाला तरी त्याचा  परिणाम तितक्या  तीव्रतेने होणार नाही. मात्र मागील काही वर्षांपासुन (तुम्हीं-आम्हीं भूमातेची कत्तल चालवली आहे तेव्हापासुन)  हा वातावरणबदल अचानक होऊ लागला आहे. काल-परवापर्यंत पाऊस व थंड वातावरण आणि लगेच एक-दोन दिवसात अंगाची काहिली करणारा उन्हाळा!याला काय म्हणायचे? या अचानक होणा~या बदलाबरोबर शरीराने कसे काय जमवून घ्यायचे?

कधी कधी तर दिवसा आकाशात सूर्य तळपत असतो, उकाडा वाढतो,घामाच्या धारा वाहू लागतात आणि अचानक सायंकाळी वारे वाहू लागतात, ढग जमून येतात,काळोख दाटून येतो आणि पाऊस पडू लागतो किंवा रात्री ढग गडगडायला लागतात,विजा चमकू लागतात व धुवांधार पाऊस पडू लागतो. कोणता ऋतु समजायचा हा?दिवसा उन्हाळा-रात्री पावसाळा?

निसर्गात असे विचित्र बदल चोविस तासांमध्ये होत असतील तर शरीराने त्या बदलांबरोबर कसे जुळवून घ्यायचे? वातावरणातल्या या   अकस्मात  बदलांबरोबर जुळवून घेण्याची शरिराची धडपड म्हणजेच या दिवसात दिसणारे आजार! याचमुळे काश्यपसंहितेने ’ऋतुमध्ये होणारा अकस्मात बदल’ हे  शरीर-संचालक वात-पित्त-कफ या तीन दोषांमध्ये विकृती होण्याचे एक महत्त्वाचे कारण सांगितले आहे आणि ते  आयुष्य क्षीण करण्यास कारणीभूत होते असेही म्हटले आहे.

दुसरीकडे  जरी पाऊस थांबला तरी शरदात  वाढलेली सूर्यकिरणांची  तीव्रता वर्षा ऋतुमध्ये ओलसर-गार वातावरणाची सवय झालेल्या शरीराला सहन होत नाही. शरीरातला ओलावा (मोईश्चर) सुर्याच्या उष्णतेमुळे सुकून जातो . ओलावा कमी झाल्याने शरीरातले विविध स्त्राव  संहत होतात.पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने पित्त सुद्धा तीव्र होते. एकंदरच शरदातल्या  उष्म्यामुळे शरीरात उष्णता (पित्त) वाढून शरीर विविध पित्त विकारांनी  त्रस्त होते. त्यात तुम्ही जर उन्हाळा सुरु झाला म्हणून वर्षा ऋतुला (पावसाळ्याला)  अनुकूल झालेल्या आपल्या आहारविहारामध्ये अचानक बदल केलात तर तो बदल शरीराला अधिकच रोगकारक होईल आणि  या नाही तर त्या  पित्तविकाराने  त्रस्त व्हाल, त्यात पुन्हा तुम्ही पित्त (उष्ण) प्रकृतीचे असाल तर अधिकच! 

शरद ऋतुमध्ये एकंदर  शरीराभ्यन्तर परिस्थिती अशी असते आणि लोकांमध्ये सुद्धा अशी लक्षणे दिसतात की शरीरामध्ये केवळ पित्ताचा नाही तर पित्ताबरोबरच वात व कफ अशा तीनही दोषांचा प्रकोप होतो की काय अशी शंका येते. वास्तवात हारीतसंहितेने शरद ऋतुमध्ये कधी कधी, काही-काही शरीरांमध्ये वात-पित्त-कफ या तीनही दोषांचा प्रकोप सुद्धा होतो असे म्हटले आहे. तीनही दोषांचा प्रकोप म्हणजे शरीर विकृत आणि विविध रोगांना आमंत्रण.  

त्यामुळेच या  दिवसांत  कुटुंबामधील एकतरी सदस्य काही ना काही आरोग्य-तक्रारीने त्रस्त असतो. म्हणूनच तर शरदऋतु हा अनेक आजार निर्माण करुन  वैद्यांना भरपूर रुग्ण पुरवून त्यांना खुष ठेवतो, म्हणून त्याला वैद्य-डॉक्टरांची काळजी घेणारी आई ,या अर्थाने ’वैद्यानां शारदी माता’ असे संबोधले आहे.    

( मानवी आरोग्य ठणठणीत ठेवण्यासाठी आयुर्वेदाने सांगितलेल्या ऋतुचर्या या विषयाची सविस्तार माहिती देणाऱ्या ऋतुसंहिता या वैद्य अश्विन सावंत लिखित आगामी पुस्तकामधून)

 

संग्रहिका –  श्रीमती अनिता जयंत खाडीलकर

सह्याद्री अपार्टमेंट, खाडीलकर गल्ली, बालगंधर्व नाट्यमंदिर समोर, ब्राह्मणपुरी, मिरज,जि. सांगली

मो 9689896341

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ अनोखे व्रत नवरात्रीचे…. ☆ प्रस्तुती – सौ. अर्चना सुरेश देशपांडे

सौ. अर्चना सुरेश देशपांडे

?  वाचताना वेचलेले ?

☆ अनोखे व्रत नवरात्रीचे ☆ सौ. अर्चना सुरेश देशपांडे 

खरं तर हा लेख नसून मनापासून केलेलं एक आवाहन आहे.

नवरात्रात अनेक व्रते केली जातात. कोणी नऊ दिवस उपवास करतात,गादीवर झोपणं वर्ज्य करतात.वहाणा वापरत नाहीत, तर कोणी नऊ दिवस जोगवा मागतात. हल्ली एक नवीन प्रकार सुरू झाला आहे. तसा तो वाईट नाही, पण त्याचा अतिरेक झाला आहे. मुख्य म्हणजे हा प्रकार धार्मिक नाही . कोण्या एका व्यापाऱ्याने स्वतःचा व्यवसाय वाढावा म्हणून नऊ दिवस नऊ रंगाच्या साड्या, ड्रेस वापरण्याची टूम काढली आणि सर्वांनी ती डोक्यावर घेतली. प्रत्येकीला ते सहज शक्य आणि परवडणारे असतेच असे नाही. कुणीतरी असली धार्मिक आधार नसलेली प्रथा चालू करतात आणि सर्वजण ती अंधपणे आचरणात आणतात. ह्या प्रथांची रूढी बनते

 चला तर आपण नवीन प्रथा सुरू करूया. नवरात्रातला प्रत्येक दिवस सत्कारणी लावायचा असे आपण व्रत घेऊया. उतायचे नाही  मातायचे नाही, घेतला वसा टाकायचा नाही हे पक्के करू या.

पहिला दिवस-  या दिवशी आपण स्वतःपासून सुरुवात करुया, स्वतःचे लाडकोड स्वतः पूर्ण करू या, हवं ते खाऊया आणि आवडते छंद जोपासूया. पण मनाशी एक गोष्ट पक्की करायची की मन मारायचं नाही, कुठलीही इच्छा दडपायची नाही. कुठल्याही कारणाने पुढे ढकलायचे नाही.

दुसरा दिवस–  हा दिवस आपल्या जवळच्या लोकांचे लाड.कौतुक करण्यात घालवूया. त्यांना आठवणीने  त्यांचं तुमच्या आयुष्यातलं महत्त्व जाणवून देऊया. प्रत्येकाला हे मनापासून ऐकायचं असतं.

तिसरा दिवस–  हा दिवस देऊया मैत्रिणींना आणि स्नेह्यांना.  दुरावले असतील तर फोन करा. जवळ असतील तर एकत्र ‌जमून आनंदात वेळ घालवा. ” माझ्यासाठी मैत्री किती महत्वाची आहे “ ही भावना त्यांच्यापर्यंत पोचू द्या.

चौथा दिवस-  या दिवशी गरजू व्यक्तींना मदत करायची. ही मदत पैसे, वस्तू, शब्द कोणत्याही स्वरुपात चालेल. मग ती व्यक्ती वृद्धाश्रम- अनाथ आश्रम येथील चालेल_

पाचवा दिवस  – विद्या “ व्रत “ आहे असं म्हणूया. शिक्षणासंदर्भात जिथे जेवढी जमेल तशी मदत करू या. विद्यार्थ्याला शैक्षणिक साहित्य द्या, किंवा कुणाला काही शिकवा. शाळेला, ग्रंथालयाला मदत करा.

सहावा दिवस – हा दिवस राखून ठेवूया मुक्या प्राण्यांसाठी. ” गोशाळांना” भेट द्या. प्राण्यांना स्वतः चारा खाऊ घाला.  प्राणी संस्थांना मदत करा.

सातवा दिवस – हा दिवस निसर्गासाठी ठेवूया. एक तरी रोपटे लावूया, आणि निसर्गाचे संवर्धन करून पर्यावरणाचा समतोल राखू या

आठवा दिवस – हा देशासाठी ठेवू या. माझा देश, माझे राष्ट्र, माझा जिल्हा यासाठी आपण काय करू शकतो, याचा विचार करूया.  आपला परिसर स्वच्छ ठेवू या.  सरहद्दीवरील सैनिकांना दोन प्रेमाचे शब्द पाठवूया

नववा दिवस-  ” पूर्णाहुतीचा” दिवस. सर्व वाईट चालीरीती, रुढी आणि दुष्ट विचारांची आहुती देऊ या. सकारात्मक विचारांच्या  पुरणाच्या दिव्यात माणुसकीच्या ज्योती लावून त्याआदीशक्तीची आरती करु या. आपुलकीचा, एकात्मतेचा गोड प्रसाद वाटू या.

दहावा दिवस – सीमोल्लंघनाचा दिवस. आप़ण केलेल्या निर्धाराप्रमाणे, आपले मन नकारात्मक विचारांचा उंबरठा ओलांडून पुढे गेले आहे का हे बघा. मन मोकळं करा, लिहा बोला पण व्यक्त व्हा.  कारण विचार आणि कृती बदलणे हेच खरे सीमोल्लंघन होय .मग आनंदाचा सोनेरी दसरा आपल्या आयुष्यात कायम असेल आणि प्रसन्न झालेल्या आदिशक्तीचा कृपाशिर्वाद ही पाठीशी असेल.

—-ही सगळं करताना त्या त्या दिवसाच्या रंगाचे कपडे परिधान करू नका असे नाही.  पण नुसता कपड्याचा रंग बदलण्यापेक्षा आपले मळकट झालेले विचार बदलूया.

बोला मग हे व्रत घ्यायला आवडेल ना तुम्हाला?

आई जगदंबेचा उदो उदो

©  सौ. अर्चना सुरेश देशपांडे

पुणे

मो. ९९६०२१९८३६

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ देणाऱ्याची भूमिका कशी असावी ? ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित

श्री सुहास रघुनाथ पंडित

? वाचताना वेचलेले ?

 ☆ देणाऱ्याची भूमिका कशी असावी? ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ 

आमच्या जी. एस्. मेडिकल कॉलेजच्या मराठी वाङ्मय मंडळातर्फे विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर आणि वसंत बापटांच्या एकत्रित काव्यवाचनाचा कार्यक्रम ठेवला होता. शनिवार दुपार होती ती. कार्यक्रम रंगला. संपला. मी या मंडळाचा त्या वर्षाचा कार्यवाह. मानधनाची पाकिटे तिन्ही कविवर्यांना दिली. 

विंदा म्हणाले, “तुमचे हाडाचे हॉस्पिटल कुठे आहे?”

“टाटाच्या समोर… जवळच आहे…. पाहायला जायचं आहे का कुणाला? …” मी म्हणालो.

विंदांचा वाटाड्या होऊन आम्ही ऑर्थोपेडीक सेंटरमध्ये गेलो. काही रुग्णांचा मुक्काम तिथे अनेक महिने असायचा. विशेषतः फ्रॅक्चरचे रुग्ण. घरात संडासापासूनच्या सोयीची कमतरता. त्यामुळे हॉस्पिटलात सक्तीचा निवास. नवीन पेशंट्सचा दट्ट्या असायचा. मग वॉर्डातले काही पेशंट्स पॅसेजमध्ये यायचे. पॅसेजमधून वॉर्डाबाहेरच्या मोकळ्या जागेत.

विंदाना ज्या बाईंना भेटायचं होतं त्या अशाच एका पॅसेजमध्ये होत्या. शाहीर अमर शेखांच्या पत्नी. आम्ही त्यांना “शोधून” काढलं. विंदांनी त्यांची चौकशी केली. खिशातून पाकीट काढलं. आमच्या मंडळाने दिलेल्या मानधनाच्या पाकिटात त्यांनी जिना चढतानाच थोडे पैसे (स्वतःजवळचे) भरले होते. ते पाकिट त्यांनी बाईंच्या हातात दिलं. 

“औषधासाठी होतील म्हणून शिरूभाऊंनी दिले आहेत. मी आज इथे कार्यक्रमाला येणार होतो. म्हटलं नेऊन देतो.”

थोड्या वेळाने आम्ही बाहेर पडलो. मीही विंदांबरोबर बसस्टॉपवर आलो. विचारू की नको अशा मनातल्या गोंधळावर मात करत मी प्रश्न विचारला. तोही घाबरतच. 

“तुम्ही त्यांना मदत केलीत, पण शिरूभाऊंचे नाव का सांगितलंत?…” 

शिरूभाऊ म्हणजे बहुधा त्यांचे मित्र श्री. ना. पेंडसे असावेत.

विंदांनी त्यांच्या खास नजरेने माझ्याकडे आरपार बघितलं.

 “असं बघा… घेणाऱ्याचं मन आधीच बोजाखाली असतं की आपल्याला कुणाकडून तरी मदत घ्यावी लागतेय… अशावेळी याचक होतं मन. देणाऱ्याकडून समोरासमोर घेताना त्रास वाढतो. कमी नाही होत… अशावेळी आपण निरोप्या झालो तर समोरच्याचा त्रास वाढत तरी नाही… शेवटी महत्त्वाचं काय… त्या व्यक्तीला मदत मिळणं… कुणी केली हे नाही….”

माझी विंदांशी काही ओळख नाही. ही आमची शेवटची भेट. पण माझ्या मनात त्या वेळी लागलेले हजारो वॅटचे लाईट अजून विझलेले नाहीत.

 देणाऱ्याने देताना, घेणाऱ्याच्या भूमिकेत स्वतःला नेणे …. ते सारे क्लेष क्षणभर अनुभवणे  …..  पुन्हा देण्याच्या भूमिकेत येणे …  आणि  “इदं न मम” असं म्हणत यज्ञवृत्तीने दान करणे.

मी empathy ची व्याख्या मानसशास्त्राच्या पुस्तकातून शिकण्याआधी कवीकडून शिकलो याचा मला अभिमान आहे…

 

डॉ. आनंद नाडकर्णी

(विषादयोग)

 

संग्राहक : सुहास पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ नारीशक्ती ☆ संग्राहिका – सौ.अंजली दिलिप गोखले

सौ.अंजली दिलिप गोखले

? वाचताना वेचलेले ??‍?

☆ नारीशक्ती ☆ संग्राहिका – सौ.अंजली दिलिप गोखले ☆ 

तू नऊ दिवस नऊ रंग परिधान केलेस किंवा नाही केलेस तरी, हे कबूल आहे की, तू आहेस म्हणून रंगहीन आयुष्य रंगीत होतं! 

केवळ शास्त्रात सांगितलंय म्हणून नाही, तर त्यानिमित्ताने वर्षभर कपाटात पडून राहणाऱ्या जरीच्या साड्या बाहेर पडून तुला उत्साहाने नेसायला मिळतात हे सत्य नाकारू शकत नाही! 

दांडिया खेळलीस किंवा नाही खेळलीस, तरी आपण हे नाकारू शकत नाही की घरातील सर्वांच्या आयुष्याचा खेळ केवळ तू आयुष्यात असण्याने सुखकर होतो! 

तू नऊ दिवस उपवास कर किंवा उठता बसता उपवास कर, तरी सर्वांना हे माहिती आहे की घरातल्यांची उपासमार होऊ नये म्हणून तू आयुष्यभर तुझ्या जीवाचं रान करतेस!

तू घट बसव किंवा तुझ्या देवीला फुलांनी सजव, पण पुरुषांच आयुष्य मात्र तूच सजवलं आहेस!

तू दिवा लाव किंवा पणती लाव, पण या विश्वाच्या निर्मितीपासून तुझ्यामुळेच पुरुषांच्या आयुष्यात प्रकाश आहे!

थोडक्यात काय तर…

तूच धरती आहेस…

तूच आकाश आहेस…

तूच सुरुवात आहेस…

आणि शेवटही तूच आहेस!

तुझ्याच कुशीत जन्माला येऊन तुझ्याच कुशीत विसावून निर्धास्तपणे आयुष्य जगणाऱ्या समस्त पुरुषांनी तुझ्यातील स्त्रीत्वाला सलाम करायला हवा!

प्रत्येक स्त्री मधील नारी शक्तीला मानाचा मुजरा!!

संग्रहिका – सौ.अंजली दिलिप गोखले

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ अप्रूप पाखरे – 16 – रवींद्रनाथ टैगोर ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ अप्रूप पाखरे – 16 – रवींद्रनाथ टैगोर ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ 

[८१]

जितका मृदू

ईश्वराचा उजवा हात

तितकाच कठोर

त्याचा डावा हात

 

[८२]

दिवसाचं फूल माझं

पाकळ्या गाळल्या त्याने

विस्मृतीच्या खोल विवरात

पण संध्याकाळी

छान पिकलं ते

आठवणीचं सोनेरी फळ बनून          

 

[८३]

किती क्रूर असतात

माणसं !

किती कोमल असतो

माणूस

 

[८४]

धरतीनं झिडकारलं प्रेम त्याचं

म्हणून तडफडणार्‍या

कुणा अनाम देवाचा

व्याकूळ आक्रोशच

हे वादळ म्हणजे

 

मूळ रचना – स्व. रविंद्रनाथ टैगोर 

मराठी अनुवाद – रेणू देशपांडे (माधुरी द्रवीड)

प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares