☆ “ट्रीप खूप लहान आहे…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री कमलाकर नाईक ☆
एक स्त्री बसमध्ये चढली.एका पुरुषाच्या शेजारी बसताना त्याला तिची बॅग लागून मार लागला.परंतु तो पुरुष काहीही बोलला नाही.
त्या बाईने त्याला विचारले की तिची बॅग त्याला लागली, तेव्हा त्याने तक्रार कशी केली नाही ?
त्या माणसाने हसून उत्तर दिले:
“एवढ्या क्षुल्लक गोष्टीबद्दल नाराज होण्याची गरज नाही. कारण आपला ‘एकत्र प्रवास’ खूप छोटा आहे.मी पुढच्या थांब्यावर उतरत आहे.”
या उत्तराने महिलेला खूप त्रास झाला. तिने त्या पुरुषाची माफी मागितली आणि तिला वाटले की हे शब्द सोन्याने लिहावेत!
आपल्यापैकी प्रत्येकाने हे समजून घेतले पाहिजे की या जगात आपल्याकडे वेळ इतका कमी आहे, की निरुपयोगी युक्तिवाद, मत्सर, इतरांना क्षमा न करणे, असंतोष आणि वाईट वृत्तीने वागणे हा वेळ आणि शक्तीचा हास्यास्पद अपव्यय आहे.
तुमचे हृदय कोणीतरी तोडले आहे का ? शांत राहा.
ट्रीप खूप लहान आहे..!
कोणी तुमचा विश्वासघात केला, धमकावले, फसवले किंवा तुमचा अपमान केला ?
आराम करा – तणावग्रस्त होऊ नका.
ट्रीप खूप लहान आहे..!
कोणी विनाकारण तुमचा अपमान केला का?वाईट बोलले का? शांत राहा.दुर्लक्ष करा.
ट्रीप खूप लहान आहे..!
तुम्हाला ‘न आवडलेली’ टिप्पणी कोणी केली आहे का? शांत राहा.दुर्लक्ष करा.क्षमा करा.त्यांना तुमच्या प्रार्थनेत ठेवा आणि त्यांच्यावर प्रेम करा.
ट्रीप खूप लहान आहे..!
कोणी आपल्यासमोर कितीही समस्या आणल्या, त्याचा विचार केला, लक्षात ठेवला तरच ती समस्या निर्माण होते. कारण आमचा ‘एकत्र प्रवास’ खूप छोटा आहे..!
आपल्या सहलीची लांबी कोणालाच माहीत नाही… उद्या कोणी पाहिला नाही… तो कधी थांबेल हे कोणालाच माहीत नाही..!
आपली एकत्र सहल खूप लहान आहे.चला. मित्र, नातेवाईक आणि कुटुंबाचे कौतुक करूया.त्यांचा आदर करूया. आपण आदरणीय, दयाळू, प्रेमळ आणि क्षमाशील होऊ या. आपण कृतज्ञता आणि आनंदाने भरून जाऊया, कारणआपली एकत्र सहल खूप लहान आहे!
तुमचे हास्य सगळ्यांसोबत शेअर करा.तुमचे जीवन सुंदर व आनंदी बनण्यासाठी तुम्हाला हवा तसा तुमचा मार्ग निवडा. कारण आपली सहल खूप छोटी आहे.
कवी :अज्ञात
संग्राहक : श्री कमलाकर नाईक
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
त्या आडवाटेवर आमची गाडी अचानक बंद पडली होती. सूर्यास्त होण्याच्या मार्गावर होता. ड्रायव्हर निष्णात मेकॅनिकदेखील होता त्यामुळे काळजीचं कारण नव्हतं. फक्त जास्त अंधार व्हायच्या आत आमचा पुढचा प्रवास सुरु होणं गरजेचं होतं.
दूरवर नजर टाकली तेव्हा तिथे टपरीवजा छोटंसं हाॅटेल दिसलं मला. बुडत्याला काडीचा आधार तसं उपासमार होणार नाही, इतपत समाधान मला होतं. ड्रायव्हरला सांगून मी आणि माझे दोन सहकारी टपरीच्या दिशेने चालायला लागलो.
टपरीवर पोहोचल्यावर वेगळंच दृश्य पाहायला मिळालं. दोन चार टेबलं आणि बाकडी ठेवली होती. त्यावर बसून गावातली माणसं डाळभात खात होती. त्यांच्या पोशाखावरून त्यांच्या कष्टकरी आयुष्याचा अंदाज येत होता. वाढलेला डाळभात खाऊन पत्रावळी उचलून रस्त्यालगत ठेवलेल्या मोठ्या डब्यात टाकून ती मंडळी टपरी बाहेर पडत होती. सगळं कसं शिस्तबद्ध पद्धतीने सुरू होतं. ते बघून मला आश्चर्य वाटलं.
आम्हाला बघून एक मुलगा पुढे येत आम्हाला म्हणाला, ” काय खाणार साहेब? भजी, मिसळपाव, वडापाव, भुर्जी पाव. गरमागरम मिळेल सगळं. ” हे ऐकून माझ्या जीवात जीव आला.
“साहेब तुम्ही तिथे टेबल खुर्ची ठेवली आहे तिथे बसा. ” त्याने बोटाने दाखवलेल्या ठिकाणी आम्ही बसलो.
आधी दोन प्लेट मिक्स भजी मागवली. ती खाताना माझी नजर सारखी डाळभात खाणाऱ्या लोकांच्या टेबलावर जात होती. शेवटी न राहवून मी खुर्चीवरून उठून तिथे पोहोचलो.
“काय झालं साहेब?” तो मघाचाच मुलगा पुढे येत मला विचारु लागला.
“ही डाळभात खाणारी माणसे कोण आहेत?”
“ते माझा बा तुम्हाला सांगेल, ” असं म्हणून त्या मुलाने त्याच्या वडिलांना बोलावून घेतले आणि मी काय विचारतोय ते त्यांना सांगितले.
एक साधारण पन्नाशीच्या आसपासचा माणूस आमच्या जवळ आला आणि मला म्हणाला, ” राम राम साहेब. तुम्हाला जे बघून आश्चर्य वाटलं, तो अन्न सोहळा रोज इथे सकाळ संध्याकाळ सुरू असतो.
ए, आतून दोन तीन चांगल्या खुर्च्या आण बरं. “त्याने टपरीच्या दिशेने आवाज दिला. आतून आलेल्या खुर्चीवर आम्ही दोघे बसलो आणि तो माणूस सांगायला लागला,
“माझा जन्म इथूनच आत ४-५ किलोमीटरवर असलेल्या गावात झाला. माझे आई वडील कोण ते आठवत देखील नाही मला. उघड्यावरच जगायचो. कोणी चार घास दिले तर ते खायचो. नाहीतर पाणी पिऊन दिवस काढायचो. माझ्या बाला ह्या टपरीवर कोणीतरी हाताशी पाहिजे होतं. त्याने मला गावातून उचलून इथे आणला. त्या दिवसापासून तो माझा बा झाला. पडेल ते काम मी करायचो. पुढे पुढे किचनचं काम शिकून घेतले. माझ्या हाताला चव होती. सुरवातीला फक्त भजी आणि चहा विकणारा बा नंतर मिसळपाव, वडापाव, भुर्जी पाव, नेसकाॅफी ठेवायला लागला. इथे आसपास खाणीत आणि उसाच्या मळ्यात काम करणारे पुष्कळ कामगार आणि ट्रकवाले, ट्रॅक्टरवाले इथे यायला लागले. टपरी चोवीस तास उघडी असायची. बाला नंतर चांगले दिवस दिसले. माझं लग्न लावून दिलं त्यानं. बाने खूप गरिबी आणि उपासमारी बघितली. चांगले दिवस आल्यावर त्याने हा अन्नसोहळा सुरू केला. रोज सकाळी आणि संध्याकाळी इथे गरिबांना डाळभात आणि लोणचं देतो आम्ही खायला. त्याचे पैसे घ्यायचे नाहीत असं बाने शिकवलंय मला. आपल्यातले चार घास उपाशी माणसाला द्यावे हे बाने शिकवलं मला. असं केल्याने आपण काही मरत नाही; पण दुसऱ्याला जगण्याची ताकद मिळते, असं समजावून सांगायचा मला तो. तो आजारी झाल्यावर माझ्याकडून वचन घेतले त्यांनी, हा अन्न सोहळा पुढे चालू ठेवण्याचा.
आता मी आणि माझा मुलगा ही परंपरा पुढे चालवत आहोत.
बा म्हणायचा, “नुसतं गोणीभर जमवून काही उपयोग नसतो. तर त्या पैशांतून गरिबांना मदत करायला हवी आपण. देवाचं लक्ष असतं सगळ्यांकडे. आपण गरीबांना जमेल तेवढे सुखी ठेवलं, की देव आपल्याला पण सुखी ठेवतो. एका हाताने दिलं, की दुसऱ्या हाताने देव देऊन आपला तोल जाऊ देत नाही. नुसतं गोणी भरत गेलो, की पैशाला पाय फुटतात आणि नको त्या रस्त्यावर आपण कधी जाऊन पोहोचतो ते आपल्याला कळत नाही. ज्या मातीशी आपण इमान राखत नाही, त्याच मातीत आपलं जीवन आपण आपल्याच हाताने उद्ध्वस्त करतो.
बा शिकला नव्हता. पण जगण्याच्या शाळेचा तो मास्तर मात्र होता.
त्याने सुरू केलेला हा अन्न सोहळा जिवात जीव आहे तोपर्यंत मी चालू ठेवणार आणि माझ्या नंतर माझा मुलगा…. नंतर माझा नातू…..
गाडी दुरुस्त झाल्याचा निरोप आला. त्या माणसाचा निरोप घ्यायची वेळ आली. पाकिटातून हाताला लागल्या तेवढ्या नोटा काढून मी त्याच्या हातात ठेवल्या.
“साहेब हे काय?”
“अरे, माझ्याकडून छोटीशी भेट तुझ्या अन्न सोहळ्याला. आज तू मला काहीतरी चांगलं शिकवून गेलास. जगण्याची किंमत त्यालाच जास्त चांगली माहीत असते, ज्याला उद्या काय होणार, ह्याची चिंता सतावत असते.
हा सोहळा तुझ्या हातून अखंड सुरू राहो हीच देवाजवळ प्रार्थना मी दररोज करीन. हे माझं कार्ड आहे. चुकून कधीतरी समजा, वेळ आलीच ह्या सोहळ्यात खंड पडण्याची, तर मला अवश्य फोन कर. मी असेन तुझ्या सोबत, जमेल तेवढा हातभार लावायला.
त्याने पाया पडून माझा आशीर्वाद घेतला आणि मी माझ्या सहकाऱ्यांसोबत गाडीच्या दिशेने पावलं टाकायला सुरुवात केली.
लेखक : श्री. सतीश बर्वे.
प्रस्तुती : सौ. शामला पालेकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ सहज संस्कार… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. सुचिता पंडित ☆
☆
नवविवाहित दांपत्य यथावकाश एका बाळाला जन्म देवून आई बाबांच्या भूमिकेत येतं. मूल हसतं, खेळतं, रडतं, आजुबाजूला पाहतं, वेगवेगळे आवाज ऐकतं, ओळखीचे चेहरे पाहून त्याची कळी खुलते, अनोळखी चेहरे त्याला गोंधळात टाकतात, ते अखंडपणे हातपाय हालवत असतं. घरातले, शेजारी, नातेवाईक बाळ बघून त्याच्याशी बोलत असतात. ते बाळ कुतूहलाने सगळ्यांकडे पहात हळूहळू मोठं होत असतं.
बाळाच्या निरागसतेने सगळ्या घरात नवचैतन्य संचारतं.
हे निरागस बाळ तुमच्या माध्यमातून या जगात आलं, तरी ते सर्वस्वी तुमचं नसतं. त्याचा सांभाळ करताना त्याला संस्कारित करण्याची तुमच्यावर मोठी जबाबदारी आहे. या नकळत्या वयात तुम्ही त्याच्यावर जे जे संस्कार करता, ते सर्व ते चटकन ग्रहण करते.
तुमचं खरं खोटं बोलणं, तुम्ही इतरांची जी स्तुती किंवा निंदानालस्ती करता, कुणाला मदत करता, कोणाचं हिसकावून घेता, कुणाबद्दल तुमची करुणा, कोणाचा तुम्ही केलेला छळ, तुमचा स्वार्थ, परमार्थ, तुमचा धर्म आणि अधर्म, तुम्ही एकमेकांशी कसे वागता, बोलता, आदराने वागता की अनादर करता, मृदूमधूर स्वरात बोलता की कर्कश्शपणे, असे सारे काही त्या बाळावर परिणाम करत असते. यातूनच पुढे ते सुसंस्कृत होईल की असंस्कृत, हे ठरतं.
थोडक्यात तुमचं बाळ तुमच्या गुण किंवा अवगुणांचा विस्तार असतं. म्हणून खूप विवेकाने वागा.
स्वामी विवेकानंद म्हणतात : या विश्वात प्रत्येक गती चक्राकार आहे. त्याचा जिथून आरंभ होतो, तिथेच फिरून शेवट होतो, तोपर्यंत वर्तुळ पूर्ण होत नाही. आणि वर्तुळ पूर्ण होते, तेव्हा तुम्ही जे दिले, तेच तुम्हाला परत येऊन मिळते. तुमची इच्छा असो वा नसो.
तुम्ही एकदा चुकलात की त्या चुकीचा जणू वज्रलेप झाला. तुम्ही चूक कबूल करून क्षमा मागितली तरी निरागस अपत्याला तुमचे स्पष्टीकरण, समर्थन समजत नाही. तुम्ही केलेली कृती समजते.
तुम्ही बाळ अगदी गर्भात असल्यापासूनच त्याच्याशी संवाद सुरू करा. तुम्ही त्याच्या आगमनाची उत्कटतेने प्रतिक्षा करत आहात, हे त्याला सांगा.
तुम्ही जे जे बोलता, त्याचा अर्थ त्याला कळला नाही, तरी त्यामागील भावना त्याला कळतात. ते निश्चिंत होतं किंवा भयभीत होतं.
ज्यांचं बालपण असुरक्षित असतं, ते आक्रमक, हिंसक होतात. ज्यांची प्रेमाने काळजी घेतली जाते, ते इतरांची काळजी घ्यायला शिकतात.
तुमच्या वर्तनातून तुमचं अपत्य स्वत:च्या स्वभावाची जडणघडण करीत असतं.
थोडक्यात, हिंदू तत्त्वज्ञानातील अत्यंत महत्त्वाच्या कर्माच्या सिद्धांताच्या सत्यतेचा तुम्ही प्रत्यक्ष अनुभव घेत असता.
तुम्ही जे पेराल तेच उगवतं हे नीट समजून घ्या. जे उगवावं असं वाटतं, तेच पेरा.
महाभारतात पितामह भीष्मांचं एक अत्यंत महत्त्वाचं वचन आहे, ज्याची सत्यता कालातीत आहे.
ते म्हणतात ” पेरलेले बीज, केलेले कर्म आणि उच्चारलेले वचन कधीच निष्फळ ठरत नाही. ” ते फळाला जन्म देतंच देतं. हा शाश्वत सिद्धांत आहे, आणि नियती याची अंमलबजावणी अत्यंत काटेकोरपणे, प्रसंगी निर्दयतेने करते.
मोठमोठी साम्राज्ये लयाला जातात, राजघराणी अन्नाला महाग होतात, श्रीमंती पाहता पाहता लुप्त होते, कुटुंबांचा निर्वंश होतो, जिथे कधीकाळी ऐश्वर्य नांदत होते, तिथे घुशी बिळं करतात, वटवाघळं वस्ती करतात.
हे ऐकायला भयंकर वाटेल पण याची सत्यता कोणत्याही समाजाला अनुभवास येते.
यासाठीच हिंदू संस्कृतीत सकारात्मक, पवित्र, भावात्मक, प्रेम संक्रमित करणारे, ईश्वरी अधिष्ठानावर दृढ विश्वास ठेवून सुसंस्कार केले जातात. आपल्याला अपत्यांवर असेच संस्कार करायचे आहेत.
मूल संस्कारित करताना, त्याला उगवता सूर्य दाखवा, पक्षांची किलबिल ऐकू दे, सुस्वर संगीत ऐकवा, काऊचिऊच्या गोष्टी ऐकवा, गायीचा स्पर्श अनुभवू द्या, स्पर्शातील प्रेमाने थरथरणारी गायीची त्वचा त्याला प्रेम स्पर्शाने संक्रमित होतं, हे न सांगता कळायला लागेल.
कुत्र्याच्या पाठीवर हात फिरवला की तो किती प्रेमाने प्रतिसाद देतो, हे कळेल, यातून आपल्यावर नि:सीम प्रेम करणा-यांना कसा प्रतिसाद द्यायचा हे शिकता येईल.
निसर्ग, वृक्ष, पशू, पक्षी, पाण्यावरचे तरंग, हवेचा हळूवार स्पर्श, फुलांचे सुगंध, सूर्याचे तेज, चंद्राची शीतलता, अंधाराचं अज्ञातपण, काजव्यांचं आणि चांदण्यांचं चमकणं, पहिल्या पावसाच्या थेंबात भिजणं, भूमीचा मृद्गंध, पानाफुलांचं टवटवीत असणं, तक्रार न करता कोमेजून जाणं त्याला पाहू दे.
त्याला हे समजेल की आजची टवटवीत फुलं उद्याचे निर्माल्य होतात. जीवनातील नश्वरता अशी सहज समजावी.
निसर्गासारखा नि:शब्द शिक्षक नाही.
सकाळी उठल्यावर प्रार्थना त्याच्या कानावर पडू देत.
जमिनीवर पाऊल ठेवण्यापूर्वी आपला भार सहनशीलतेने वाहणाऱ्या भूमीला कृतज्ञतेने वंदन करायला त्याला शिकवा. तोही तुमच्या सुरात सूर मिसळून म्हणेल, ” पादस्पर्शं क्षमस्व मे ! “
त्याला जलपान करण्याची सवय लावा, त्याचे आरोग्य ठणठणीत राहील.
सकाळी आई, आजीसोबत त्याला तुळशीला एखादी प्रदक्षिणा घालू दे. पिंपळपानांची सळसळ शांतपणे ऐकू देत.
त्याच्या कानावर आजोबा पूजा करतात, त्यावेळचा मधुर घंटानाद पडू देत. देवासमोर लावलेल्या समईचा सात्त्विक प्रकाश त्याच्या निरागस डोळ्यांनी पाहू दे.
देवपूजा करताना देवाला प्रेमाने स्नान घालणं, स्तोत्र म्हणत केलेली त्याची उत्कट आळवणी त्याला पाहू दे.
दारी येणारा वासुदेव त्याला भिक्षा दिल्यावर भरभरून आशीर्वाद कसे देतो, ही निर्धनांच्या मनाची श्रीमंती त्याला अनुभवू द्या.
मंदिरात गेल्यावर काही अर्पण करण्याची सवय त्याच्या हाताना लागू द्या.
आणि हे सगळं सहजपणे त्याला पहात पहात स्वत:च शिकू द्या. तो त्याच्या क्षमतेप्रमाणे शिकेल. धाकदपटशाने हे त्याच्या गळी उतरवू नका.
त्याला मुक्तपणे वाढू द्या. आणि तुम्ही त्याला काय काय शिकवले हे सारखं लोकांसमोर म्हणून दाखवायला सांगू नका. त्याच्या वागण्यातून त्याचे व्यक्तिमत्व इतरांना आपोआपच उलगडेल.
लेखक : अज्ञात
प्रस्तुती :सौ. सुचिता पंडित
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
ज्यांच्याबद्दल अतोनात विश्वास असतो, ती माणसं कधीकधी इतकी धक्कादायक वागतात की त्या धक्क्याने आपण कोसळून जाऊ असं वाटू लागतं. जवळच्या माणसांनी केलेले विश्वासघात फार जिव्हारी लागणारे असतात. त्यामुळे लौकिक अर्थाने आपलं फारसं नुकसान झालेलं नसलं तरी भावनिक पातळीवर कधीही न भरून निघणारी हानी झालेली असते.
माणसांवरचा विश्वास उडू लागतो अशाने फार हट्ट करावासा वाटत नाही मग कशाहीसाठी आणि कोणाहीसाठी. अर्थात या पासिंग फेजेस असतात. त्या येतात आणि पुरेशी वेदना सोसून झाल्यावर जातातही. आपण आपल्या मूळ स्वभावावर येतोच पुनःपुन्हा!
पण तरीही,
फार जवळून अनुभवलं की प्रत्येकाचेच पाय मातीचे आहेत हे दिसू लागतं. मग आपण उदास होऊ लागतो. एवढ्यातेवढ्याने भारावून जाण्याचा आपला स्वभाव असू नये आणि कोणालाही पराकोटीचा आदर्श मानून बसू नये.
माणसं म्हटली की वर्तनात कमी जास्त गोष्टी व्हायच्याच आणि ते अगदी नैसर्गिक आहे. माणसांतली नाती पूर्णतः नि:स्वार्थ कधीही नसतात आणि त्यात वावगंही काही नाही, हे आपण लक्षात ठेवायला हवं. म्हणजे अपेक्षाभंगाचं दुःख वाट्याला येत नाही.
प्रत्येक मानवी नात्यात अडचणी येतातच. पण त्या सगळ्या अडचणींवर, कसोट्यांवर मात करून अखेरपर्यंत आपल्या सोबत उरतात….. ती खरी आपली माणसं. ज्यांचे हात उगीचच निसटले ते प्रवासातले तात्पुरते सोबती होते इतकंच समजायचं आणि पुढे चालू लागायचं.
रस्त्यात सांडून गेलेले सगळेच मोती वेचून आणायचं त्राण आपल्यात नसतं आणि प्रत्येकवेळी तसा हट्टही आपण करायचा नसतो. निमूटपणे विनातक्रार आपल्यासोबत चालत आलेल्या पावलांवर भिस्त ठेवायची फक्त.
ती आणि तेवढीच माणसं फक्त आपली समजायची. ऊस काढताना कोयत्याने पाचट सोलून काढतात, तशी माणसांची निवड करत रहावी लागते कायम. सरावाने ‘ओरिजिनल’ माणसं ओळखू येतात आपल्याला. भले ती चुकत असतील लाखदा, पण आपला हात सोडून जाणार नाहीत, त्यांची आपल्यावर असलेली माया कदापि आटणार नाही.
अशी चांगली माणसंही असतात आपल्या आयुष्यात अनेक…. ती मात्र जपायला हवीत.
काही लोकांसाठी आपण केवळ ‘सोय’ असतो. ते त्यांच्या सोयीने आपल्याशी वागतात, गैरसोय वाटेल तेव्हा दूर जातात. आपल्याला कोणीतरी स्वतःच्या सोयीनुसार वापरलं आणि आपण मात्र किती जेन्युईनली ते माणूस जपण्याचा प्रयत्न केला हे जेव्हा लक्षात येतं, तो क्षण फार फार दुखरा असतो.
जगताना सगळीच माणसं लागतात आपल्याला…. नाही असं नाही. पण कोणावर विश्वास टाकायचा, कोणाला जवळ करायचं आणि कोणासाठी नात्यात काही अदृश्य भिंती कायम घालून ठेवायच्या हे आपल्याला ठरवावंच लागतं. नाहीतर आपला साधेपणा हा भाबडेपणाच्या मार्गाने जाऊन बावळटपणा ठरू शकतो.
माणसं जोखणं जमायलाच हवं. समोरच्या माणसाचं ‘असत्य’ रूप आपल्याला माहिती असूनही आपण ते माहिती नसल्यासारखं दाखवणं आणि त्याच्या वागण्यातून दिसणारे विरोधाभास अनुभवणं ही गमतीदार गोष्ट असते. खोटंनाटं, उलटंपालटं बोलून-वागून आपण समोरच्याला फसवू शकतो असं काही लोकांना वाटत असतं. त्यांच्या वर्तनातल्या विसंगती आपल्या लक्षात आलेल्या असतात. मग तर त्यांची कीव येते अक्षरशः….. का वागत असतील माणसं अशी? स्वतःसह इतरांना का फसवत असतील?
ज्यांच्याशी अगदी पटतच नाही, त्यांच्यासोबत सुद्धा वाद घालून किंवा स्पष्टीकरणं देऊन आपण आपलं मानसिक स्वास्थ्य घालवू नये असं मला वाटतं. कटुता आणून, खळखळ आवाज करत नाती संपवू नयेत. झाडावरून जितक्या सहजतेने फूल निसटतं, तितकी सहजता आपल्यात असावी…. एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यातून बाजूला होताना…
लेखक : अज्ञात
संग्राहिका – शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)
कोथरूड-पुणे.३८.
मो.९५९५५५७९०८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
अंगणातलं झाड जळू नये म्हणून जिवाच्या आकांताने प्रयत्न करणारी माणसं, नातीगोती किती सहजपणे संपवतात याचं आश्चर्य वाटतं !
त्यामुळे वेळीच सावध व्हा, लक्षात घ्या घटस्फोट हा एका क्षणात किंवा किंवा एका दिवसात घडणारी गोष्ट नसते !
भांडणातली frauency वाढायला लागली, अबोला धरण्यातला कालावधी जास्त वाढायला लागला की आपलं नातं संपुष्टात येण्याचा दिवस जवळ जवळ येत आहे ही गोष्ट नीट समजून घ्या !
कागदावर पाठवलेल्या नोटीसी वर सह्या करून, दोघांनी विभक्त होऊन वेगवेगळ्या घरात रहाणे हा झाला कायदेशीर घटस्फोट !
परंतु एका छता खाली राहून, न बोलणे, न पटणे, एकमेकांची काळजी न करणे, एकटे-एकटे राहणे, जवळ असून एकमेकां पासून मनाने खूप दूर जाणे हा सुद्धा घटस्फोटच आहे !
आपण प्रेम आहे म्हणून एकत्र रहाता का, लोक काय म्हणतील म्हणून एकत्र रहाता ? हा प्रश्न स्वतःला गंभीरपणे विचारा आणि एकमेकांना पटापट माफ करा !
अहंकार कुरवळण्यापेक्षा एकमेकांत विलीन होता आलं पाहिजे !
लक्षात घ्या समुद्र मोठा होईल म्हणून नदी तिचं विलीन होणं कधीही नाकारत नाही किंवा वाहण्याचा मार्गही बदलत नाही !
शेवटच्या क्षणी……. म्हणजे मांडीवर डोकं आणि तोंडात तुळशीचं पान ठेवतांना शहाणपणा येऊन, प्रेमाचे उमाळे फुटण्यात आणि माझं चुकलं म्हणून दोन्ही हात जोडण्यात काही अर्थ नसतो !
मृत्यू समोर दिसत असताना नात्या गोत्यांचा अर्थ कळून काहीही उपयोग नसतो !
म्हणून म्हणतो क्षुल्लक कारणावरून वाद घालू नका
बॅग भरून निघून जाऊ नका
सिंगल रहाणं सोप्प नसतं, एक घरटं मोडून पुन्हा मी सुखी आणि आनंदी घरटं तयार करील, इतकी कठोर शिक्षा स्वतःला व आपल्या पार्टनरला देऊ नका !
म्हणून काय करावं ?
दुर्गुणांकडे डोळेझाक करा,
सद्गुणांचा जप करा,
कोणत्याच नात्याचा तिरस्कार करू नका,
आपलेपणाची आरती करून अहंकाररुपी कापूर जाळा
आणि स्नेहाचा प्रसाद वाटून एकमेकाला ” घालीन लोटांगण म्हणा “……. कदाचित बरेच प्रश्न मिटु शकतील !
☆
लेखक / कवी: प्रा. विजय पोहनेरकर
छत्रपती संभाजीनगर ( औरंगाबाद )
94 20 92 93 89
प्रस्तुती : सुश्री प्रभा हर्षे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ सप्रेम नमस्कार…लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’☆
सप्रेम नमस्कार….
मोगऱ्याचं फूल ओंजळीत घेतलं की त्याचा गंध मनाला, शरीराला प्रसन्न करून जातो. सहवासातील माणसाचं देखील असंच असतं. काही माणसं काही क्षणातचं मनाला खूप आवडतात, आपली होऊन जातात.
तर, काही कितीही सहवासात राहिली, तरी त्यांची आतून ओढ नसतेचं.
चेहरा बघण्यापेक्षा नेहमीचं समोरच्याच्या मनात उतरून बघावं. शोधूनही तिथं माणूसपण सापडत नसेल, तर त्याचं सुंदर दिसणंही मग किळसवाणं वाटतं.
शरीराची सुंदरता वयाबरोबर संपते, तर मनाची सुंदरता शेवटपर्यंत टिकून राहाते. शरीराला वय असतं, मनाला ते कधीच नसतं.
शेवटी काय…
आपण व्यक्तीच्या स्वभावाच्या प्रेमात असतो, शरीर तर निमित्त मात्र असतं.
माणसाच्या स्वभावात गोडवा, शालीनता, प्रामाणिकपणा आणि विनयशीलता असेल तर, त्याची काही क्षण जरी सोबत मिळाली तरी ती हवीहवीशी वाटते.
म्हणूनच बाहेर लक्ष दिव्याची सुंदर आरास असूनही, देवघरातील समईच्या तेजापुढं आपण नतमस्तक होतो.
आयुष्यात अशी माणसं कधी भेटली तर त्यांच्यावर जीवापाड प्रेम करावं.
आपल्या आवडत्या माणसाचं आपल्या सोबत असणं, ही आयुष्यातील सगळ्यात मोठी कमाई. ती प्रत्येकाच्या वाट्याला येतेचं असं नाही.
आजकाल अशी माणसं भेटतात तरी कुठे? नशिबानं कधी भेटलीचं तर हळुवार जतन करून ठेवावीत, कदाचित पुन्हा भेटतील न भेटतील?
हे मुद्दाम अशासाठी लिहिलं की अशा जवळच्या माणसांपैकी एक आहात.
आपलाच,
– – –
श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’
थळ, अलिबाग
मो. – ८३८००१९६७६
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈