मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ कानडावो विठ्ठलू….  लेखक : श्री सचिन कुलकर्णी ☆ संग्रहिका: श्रीमती मीनाक्षी सरदेसाई ☆

श्रीमती मीनाक्षी सरदेसाई 

? वाचताना वेचलेले ?

☆ कानडावो विठ्ठलू….  लेखक : श्री सचिन कुलकर्णी ☆ संग्रहिका: श्रीमती मीनाक्षी सरदेसाई ☆

‘पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, ’हा अभंग सर्वाना परिचित आहे. हा ज्ञानेश्वर माऊलीनी लिहिलेला अभंग आहे. या अभंगात आलेले दोन शब्द नेहमी वेगळे वाटायचे, एक कानडा आणि दुसरा करनाटकु. पण वाटायचे कानडा म्हणजे कानडी आणि करनाटकु म्हणजे कर्नाटक राज्यात. पण मग ज्ञानेश्वरमहाराज का करतील असा उल्लेख? तेव्हा हे राज्य थोडी असेल.

 पण या शंकेचे निरसन झाले, ४/५ वर्षांपूर्वी मला श्री. हृदयनाथ मंगेशकर यांना ऐकण्याचा योग आला, पद्मजा फेणाणी जोगळेकर यांच्या कार्यक्रमात. तेव्हा त्यांनी या शब्दांचा अर्थ असा सांगितला … कानडा म्हणजे अगम्य, समजायला अवघड, न कळणारा असा आणि करनाटकु म्हणजे नाटकी, करणी करणारा असा. हे अर्थ समजल्यावर गाण्याची गोडी अजूनच वाढते. आज मी मला समजलेला अर्थ उलगडून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तो वाचल्यावर पुन्हा एकदा गाणं ऐकत गाण्याच्या रसास्वाद घ्या. मनाला खूपच आनंद मिळेल.

 पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती। रत्नकिळा फाकती प्रभा। 

अगणित लावण्य तेज पुंजाळले। न वर्णवे तेथिची शोभा ॥१॥

 … ज्ञानदेवांच्या दृष्टीपुढे सावळा पांडुरंग उभा आहे. विविध रत्नांची प्रभा फाकावी तशी पांडुरंगाची कांती दिव्य तेजाने झळकत आहे. ज्ञानदेवांचे अंतःकरण आत्मप्रकाशाने उजळून गेले आहे. विटेवर उभा असलेल्या पांडुरंगाच्या तेजःपुंज लावण्याची शोभा काय वर्णावी? त्यासाठी शब्द अपुरे पडतात. विठूचे हे तेजःपुंज सौंदर्य अगणित व असीम आहे.

 कानडा वो विठ्ठलु करनाटकु। येणे मज लावियेला वेधु। 

खोळ बुंथी घेवूनी खुणाची पालवी। आळविल्या नेदी सादु॥२॥

… प्रकाशाचे अंग हे प्रकाशाचेच असते याप्रमाणे हा विठ्ठल कसा आहे? तर तेजःपुंज असा हा विठ्ठल, कानडा म्हणजे अगम्य, न कळणारा असा आहे. तो नाटकी (कर नाटकु) आहे. अवघ्या विश्वामधे विविध रुपात (पशु, पक्षी, माणूस सारे स्थिरचर) वावरणारा हा भगवंत नाटकी नाही तर काय आहे? सगळ्यांच्या भूमिका हाच तर करत असतो. त्याच्या या नाट्यावर तर मी भुलले आहे. माझे मन मोहून गेले आहे. त्याच्या या नाटकाचा मला वेध लागला आहे. त्याच्या नाटकाला अंत नाही की पार नाही. खोळ म्हणजे पांघरुण किंवा आवरण. प्रत्येक प्राणीमात्रांत तो आहे. विविध रुपाची कातडी पांघरुन (खोळ बुंथी घेवूनी), जणू काही तो माझ्याकडे पहा, मला ओळखा, मला ओळख असे सांगत आहे. एखाद्या लबाड मुलासारखा मला खुणावत आहे. पण हाक मारल्यावर मात्र ओ पण देत नाही ( आळविल्या नेदी सादु ). असा हा नाटकी पांडुरंग, आणि त्याच्या नाटकाबद्दल काय सांगू? विविध रुपाची खोळ घालून येत असल्याने त्याला ओळखताही येत नाही. असा हा कानडा म्हणजे कळायला मोठा कठीण आहे.

 शब्देविण संवादु दुजेवीण अनुवादु। हे तव कैसेंनि गमे। 

परेही परते बोलणे खुंटले। वैखरी कैसेंनि सांगे॥३॥

 … प्रेमाच्या अभिव्यक्तीला शब्द कशाला हवेत. आईला, ‘बाळा माझे तुझ्यावर फार प्रेम आहे ‘, हे सांगावे लागते का? न बोलता तिच्या दृष्टीत ते ओथंबून वहात असते. तसेच आपल्या देवाशी बोलायला आपल्याला शब्द कशाला हवेत? परा, पश्यंति, मध्यमा आणि वैखरी असे वाणीचे चार प्रकार आहेत. वैखरी म्हणजे शब्दात बोलतो ती, विचार करताना आपण आपल्याशी बोलतो ती भाषा म्हणजे मध्यमा, पश्यंती म्हणजे ह्रुदयाची भाषा आणि आत्म्याशी संवाद करणारी वाणी म्हणजे परा वाणी. विठ्ठलाशी बोलताना परा वाणी सुद्धा मुक होते. बोलणे खुंटते. शब्दावाचून संवाद होतो. जसे आईला तान्हुल्याला भूक लागली हे सांगावे लागत नाही, शब्दावाचून कळते तसे परमात्म्याला भक्ताचे बोलणे. न बोलता कळते. एक बोलला तर दुसरा उत्तर देईल ना? दुजेपणाशिवाय बोलणे कसे होते हे परा वाणीला जेथे सांगता येत नाही तिथे वैखरीला (जीभेला) कसे बरे सांगता येईल?

 पाया पडु गेले तव पाउलचि न दिसे। उभाचि स्वयंभू असे। 

समोर की पाठीमोरा न कळे। ठकचि पडिले कैसे ॥४॥ 

 …. या विठ्ठलाचा नाटकीपणा किती सांगू? पायावर डोके ठेवायला गेले तर पाउलची न दिसे. समोर पहावे तर उभा आहे. पण माझ्या समोर उभा आहे की पाठमोरा उभा आहे हेच कळत नाही. माझ्या पुढे आहे की माझ्या मागे उभा आहे, खालून पाहतोय की वरून हेच समजत नाही. अशाप्रकारे हा मला सारखा फसवत (ठकचि) आहे, ठकवत आहे. आपल्या अवतीभवती सर्वत्र तोच व्यापून आहे एवढे खरे.

 क्षेमालागी जीव उतावीळ माझा। म्हणवूनी स्फूरताती बाहो।

क्षेम देऊ गेले तव मीचि मी एकली।आसावला जीव राहो॥५॥ 

त्याला आलिंगन देण्यासाठी माझा जीव उतावीळ झाला आहे. त्यासाठी माझे बाहु स्फुरण पावताहेत. मला वाटते एवढासा हा विठ्ठल.. त्याला मिठी मारणे किती सोपे. त्याला मिठी घ्यायला गेले तर मीच एकटी उरले. हा नाटकी कुठे गेला कळलेच नाही. त्याला आलिंगन देण्याची इच्छा माझी अपुरी राहिली.

बाप रखमादेवीवरु हृदयीचा जाणुनी। अनुभवु सौरसु केला। 

दृष्टीचा डोळा पाहों मी गेलीये। तव भीतरी पालटु झाली॥६॥ 

… हा विठ्ठल बाहेर नसून हृदयात वसतो असे कळले म्हणून त्याचा अनुभव घेण्यासाठी मी माझी दृष्टी आत वळवली तर काय माझे अंतरंगच बदलून गेले. आत तोच, बाहेर तोच, समोर तोच, मागे तोच, देह तोच आत्मा तोच. जिकडे पहावे तिकडे तोच. विश्वात तोच, विश्वापलीकडे तोच नाना मुखवटे घेवून त्याचे नाटक सुरूच आहे. वरवर पहायला जावे तर कसा कमरेवर हात ठेवून विटेवर निश्चल उभा आहे. जणू काही भोळा सांब. पण तुझ्यासारखा नाटकी दुसरा कोणी नाही. विश्वाची खोळ अंगावर घेऊन दडून काय बसतोस? माझ्यासारख्याला दुरून काय खुणावतोस, हाक मारल्यावर गप्प काय बसतोस, पाया पडायला आले तर पाउले लपवतोस, समोर- मागे येऊन काय ठगवतोस, क्षेम(मिठी) द्यायला गेले तर हृदयात काय लपतोस. … कळली तुझी सारी नाटके. तू पक्का नाटक (करनाटकु) करणारा आहेस आणि अनाकलनीय (कानडा) आहेस.

ज्ञानदेव स्त्री(प्रकृती) भावाने विठ्ठलाशी(पुरुष =परमात्मा) बोलतात. हे बोलणे म्हणजे एका अंगी तक्रार आहे तर दुसरीकडे त्याची स्तुती केली आहे. ज्ञानदेवांचा अद्वैतानुभव, त्यांचा साक्षात्कार या अभंगात काव्यमय रीतीने शब्दबद्ध केला आहे.

लेखक : सचिन कुलकर्णी 

संग्रहिका:  श्रीमती मीनाक्षी सरदेसाई

सांगली

मो. – 8806955070

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “हंडी…” – कवयित्री : सुश्री अश्विनी परांजपे रानडे ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

📚 वाचताना वेचलेले 📖

☆ “हंडी…” – कवयित्री : सुश्री अश्विनी परांजपे रानडे ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

हंडी बांधली षडरिपूंची

रचले सहा पदरी थर 

सहज पार करू म्हणत

चढू लागले वरवर 

*

मोह होता दही लोण्याचा 

प्रत्येकाची नजर वर 

एकमेकांच्या आधाराने 

मार्ग होई अधिक सुकर 

*

जो पोहोचे हंडीपाशी 

वाटे त्याचा मनी मत्सर 

आधाराची कडी सुटता

निसटत जाई प्रत्येक थर 

*

काम क्रोध येता आड 

एकजुटीवर होई वार 

लोभ सुटेना लोण्याचा 

कृष्ण एकच तारणहार 

*

करांगुली सावरे उतरंड 

पुन्हा एकदा रचे डाव 

कर्माचा सिद्धांत सांगे 

फळाची नकोच हाव 

*

हंडी बांधली संकल्पाची 

कर्मयोग स्मरुनी मनात

सत्कर्मांची रास रचता

समाधान ओसंडे उरात ……. 

कवयित्री :  सुश्री अश्विनी परांजपे – रानडे

प्रस्तुती : श्री सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘कृष्णा…’ – लेखिका : सुश्री दुर्गा भागवत ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ ‘कृष्णा…’ – लेखिका : सुश्री दुर्गा भागवत ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर 

तुला कसलं संबोधन लावायचं? तू आकाशासारखा वाटतोस मला, आकाश कसं सतत माथ्यावर असतं आपण जिथे जाऊ तिथे सोबत करतं पण त्याचा निळा रंग बोटावर नाही घेता येत… 

खरं म्हणजे तुझं नाव घेतल्यावर तू मानवी रूपात डोळ्यासमोर येतच नाहीस.. आधी येते ती आकाशाची गडद निळाई आणि मग त्यामागोमाग लहरत येतं एक मोरपीस… तुझं मोरपीस!

तुझ्याइतका मानवी जीवनात मिसळलेला कुठलाच देव नाही बघ! प्रत्येक नातं तू समरसून जगलास आणि वेळ येताच ते नातं त्यागून मोकळाही झालास! कधी परत वळून बघितलंस का रे मागे? तुझ्यामागे त्या माणसांचं काय झालं असेल तुझ्याशिवाय ?

तुझं सगळंच अतर्क्य! तू प्रचलित नियम मोडलेस. जन्म घेतलास वसुदेव देवकीच्या मथुरेत पण वाढलास नंद यशोदेकडे गोकुळात! दहीदुधाच्या चो-या केल्यास, भलत्या वयात गोपिकांची छेड काढलीस. सुदामा, अर्जुन, उद्धव यांचा मित्र तू होतासच पण द्रौपदीचा सुद्धा ‘सखा’ झालास. हे सुंदर नातं तू भारतीय स्त्रीला दिलंस. ‘बाईचा मित्र’ ही संकल्पनाच नव्हती तुझ्याआधी आपल्याकडे, ‘तो’ स्त्रीचा पिता, पती किंवा पुत्र असावा अशी आपली समाज रीत! विवाहित राधेचा प्रियकर झालास. अगदी प्रेमाचं प्रतिक म्हणून नाव घेताना राधेचं नाव तुझ्याआधी येतं.

पुढे अष्टनायिकांचा पती झालास तरी जरासंधाच्या तावडीतून सोडवलेल्या सोळा सहस्र स्त्रीयांना अभय दिलंस. तुझ्यानंतरही अनेक वर्षांनी सूरदासांनी तुझं बालपण त्यांच्या पदांतून मांडलं, मीरेने तुला ‘नटनागर गिरिधारी’ म्हणत साद घातली.

एक सांग, तू अनेक नाती निभावलीस पण जीव जडवलास तो फक्त राधेवर…! खरं ना? गोकूळ सोडल्यावर परत तू बासरी वाजवल्याचे उल्लेख कुठेच आढळत नाहीत.

गीतेत ‘यदा यदा हि धर्मस्य’ म्हणत तू परत येण्याचं वचन दिलं आहेस. पण आता युद्धासाठी नको रे येऊस, आम्ही माणसं म्हणजे एक एक बेट झालोय, यावर नात्यांचे पूल बांधायला ये! 

आणि हो, येताना रुक्मिणीला नाही आणलंस तरी चालेल पण राधिकेला सोबत घेऊन ये, म्हणजे तुझी बासरी ऐकायला मिळेल.

कृष्णा, पुन्हा एकदा बासरीत सूर भरायला ये !

 लेखिका : सुश्री दुर्गा भागवत

संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ शेंगदाणा विडंबन… – कवी :अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ शेंगदाणा विडंबन… – कवी :अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

भाजून सोलणे अन्

निवडून ते पहाणे

मी ओळखून आहे

कुठल्या डब्यात दाणे ॥धृ॥

 

जाता घरातूनी तू

घेईन एक वाटी

खाईन मस्त दाणे

येईल मौज मोठी

हे स्वप्न जीवघेणे

भरतो सुखे बकाणे ॥१॥

मी ओळखून आहे कुठल्या डब्यात दाणे…

 

हाती डबा जयाच्या

त्याला कसे कळावे

पोटात भूक ज्याच्या

त्यालाच दु:ख ठावे

लपवून लाख ठेवा

शोधू आम्ही दिवाणे ॥२॥

मी ओळखून आहे कुठल्या डब्यात दाणे…

 

पोटास वेदनांचा

का सांग त्रास व्हावा ?

इतका चविष्ट खाऊ

का औषधी नसावा ?

येवो कळा कितीही

सोडू आम्ही न खाणे ॥३॥

मी ओळखून आहे कुठल्या डब्यात दाणे…

कवी : अज्ञात

संग्राहक : अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ नातवंड म्हणजे नक्की काय असतं?… – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्रीमती प्रफुल्ला शेणॉय ☆

? वाचताना वेचलेले ?

नातवंड म्हणजे नक्की काय असतं? – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्रीमती प्रफुल्ला शेणॉय

नातवंड म्हणजे नक्की काय असते?

 

आजी-आबा म्हणून सारखे येऊन बिलगते तेव्हा परत एकदा आई-बाप झाल्याचा feel जे देते

ते असते नातवंड!

 

Grandparents Day ला ज्याच्यामुळे परत एकदा शाळेत प्रवेश मिळतो,

“Celebrity” म्हणून मिरवायला मिळते

ते असते नातवंड!

 

कितीही वेळा एकच गोष्ट त्याने दाखवली,

तरी दरवेळेस ज्याचे अप्रूप वाटते

ते असते नातवंड!

 

धकाधकीच्या आयुष्यात आपल्या मुलांसोबत

वेळ घालवता आला नाही

ही खंत पुसून टाकणारे एक Eraser,

ते असते नातवंड!

 

“नको ग ओरडू त्याला तो लहान आहे”

असे ज्याच्यासाठी कायमच म्हटले जाते

ते असते नातवंड!

 

गर्दीतून सुद्धा ज्याचे डोळे आपल्याला शोधतायत

हे मनाला सुखावून जे देते

ते असते नातवंड!

 

Lockdown मध्ये सुद्धा २४/७ busy ठेवणारे entertainment channel

ते असते नातवंड!

 

दमलो रे, थकलो रे असे जराही वाटून देत नाही,

Diabetes मध्ये सुद्धा चालणारे गोड गोड tonic

ते असते नातवंड!

 

आपल्याच बालपणाचे प्रतिबिंब जे दाखवते

ते असते नातवंड!

 

बस! देवा, “आता काहीच नको आयुष्यात, फक्त “तुझे” गोड गोड हसू आणि पापा हवा”!असे ज्याच्यासाठी वाटते

ते असते नातवंड!

 

कवी: अज्ञात

प्रस्तुती : श्रीमती प्रफुल्ला शेणॉय

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ मी आता म्हातारी झाले असं अजिबात म्हणायचं नाही… कवी : प्रा. विजय पोहनेरकर ☆ प्रस्तुती – सुश्री स्वाती मंत्री ☆

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ मी आता म्हातारी झाले असं अजिबात म्हणायचं नाही… कवी : प्रा. विजय पोहनेरकर ☆ प्रस्तुती – सुश्री स्वाती मंत्री ☆

 कोण म्हणतं तू म्हातारी झाली

आत्ताशिक तर तू फक्त साठीची झाली

 

मी थकले, मी दमले

असं सारखं सारखं म्हणू नको

बाई गं तुला विनंती आहे

बळंच म्हातारपण आणू नको !

 

सून आली, नातू झाला

नात झाली, जावाई आला

म्हणजे म्हातारपण येतं नसतं

स्वतःकडे लक्ष द्यायचं सोडलं की

वार्धक्य येत असतं !

 

डाय कर नको करू हा तुझा

व्यक्तिगत प्रश्न आहे

नीट नेटकं टापटीप रहा

एवढंच आमचं म्हणणं आहे

 

बैलाला झुली घातल्या सारखे

गबाळे ड्रेस घालू नको

उगीचच अधर अधर

जीव गेल्यासारखं चालू नको

 

लोकांनी आपल्याला काहीही म्हणो

आपण स्वतःला सुंदर समजावं

रिटायर्ड झालं, साठी आली

तरी रोमँटिक गाणं गावं !

 

पोथ्या, पुराणं, जपतप, कुलाचार

याला आमचा विरोध नाही

पण मी आता म्हातारी झाले

असं अजिबात म्हणायचं नाही !

 

जरी साठी आली तरी….

स्वतःसाठी वेळ द्यायचा

मैत्रिणींचा ग्रुप करायचा

ट्रिपला जायचा प्लॅन करायचा

आणि जीवनाचा आनंद घ्यायचा !

 

आणि हो

दुःखाचे तुणतुणे वाजवायचं नाही

प्रारब्ध प्रारब्ध म्हणून रडायचं नाही

 

घराच्या बाहेर पडायचं

मोकळा श्वास घ्यायचा

आणि हिरवागार निसर्ग पाहून

 धुंद होऊन ” मारवा गायचा !”

 

फिट रहाण्यासाठी सगळं करायचं

हलकासा व्यायाम, योगा

थोडा morning walk

फेशियल, मसाज, स्टीम बाथ……

सगळं कसं रेग्युलर करायचं !

कुढत कुढत जगायचं नाही

आणि म्हातारपण आलं

असं म्हणायचं नाही !

 

साठाव्या वर्षी फॅशन करू नये

असं कुणी सांगितलं ?

प्लाझो, वनपीस, जेगीन, टी शर्ट सगळं घालायचं

अन गळम्यासारखं नाही

मस्त ऐटीत, टाईट चालायचं !

 

नको बाबा! लोक काय म्हणतील?

अरे म्हणली का पुन्हा लोक काय म्हणतील ?

मग ट्रीपला काय नऊवारी लुगडं,

आणि तिखटा मिठाचा वास येणाऱ्या

मेणचट रंगांच्या साड्या घेऊन जाणार का ?

अग बाई, जगाची फिकीर करायची नाही

अन म्हातारी झाले असं म्हणायचं नाही !

 

हे सगळं तू का करायचंस,

 ते नीट समजून घे

कारण तू घराचा आधार आहेस

कुटुंबाचा कणा आहेस

वास्तू नावाच्या पंढरपुरातली

मंजुळ वीणा आहेस !

तुझं शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम राहिलं तरंच घर आनंदी राहणार आहे,

देवघरात दिवा लागून स्वयंपाक घरात

” अन्नपूर्णा येणार आहे !”

घराघरात संस्काराचा सडा

आणि चैतन्याचा झरा वाहण्यासाठी

तुझं मन प्रसन्न असणं

खूप गरजेचं आहे !

 

कवी : प्रा. विजय पोहनेरकर

फोन नं. 9420929389

संग्राहिका : श्रीमती स्वाती मंत्री  

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ पदर आईचा अन् आयुष्याचा… कवी : श्री.सुरेंद्र पाटणेकर ☆ प्रस्तुती – सौ. दीप्ती गौतम ☆

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ पदर आईचा अन् आयुष्याचा… कवी : श्री.सुरेंद्र पाटणेकर ☆ प्रस्तुती – सौ. दीप्ती गौतम

खरं तर आईच्या पोटातच आधी आईची ओळख झाली

आणि मग नऊ महिन्यांनी तिच्या

पदराची ओळख झाली.

 

पाजताना तिनं

पदर माझ्यावरून झाकला,

आणि मी आश्वस्त झालो …

तेव्हापासून तो खूप

जवळचा वाटू लागला

 

आणि मग तो भेटतच राहिला …

आयुष्यभर

 

शाळेच्या पहिल्या दिवशी

तो रुमाल झाला

 

रणरणत्या उन्हात

तो टोपी झाला,

 

पावसात भिजून आल्यावर

तो टॉवेल झाला

 

घाईघाईत खाऊन खेळायला पळताना

तो नॅपकीन झाला

 

प्रवासात कधी

तो अंगावरची शाल झाला

 

बाजारात भर गर्दीत कधीतरी

आई दिसायची नाही

पण पदराचं टोक धरून

मी बिनधास्त चालत राहायचो …

मग त्या गर्दीत

तो माझा दीपस्तंभ झाला

 

गरम दूध ओतताना

तो चिमटा झाला

 

उन्हाळ्यात लाईट गेल्यावर

तो पंखा झाला

 

निकालाच्या दिवशी

तो माझी ढाल व्हायचा.

 

बाबा घरी आल्यावर,

चहा पाणी झाल्यावर,

तो पदरच प्रस्ताव करायचा ….

 

छोटूचा रिझल्ट लागला…

चांगले मार्क पडले आहेत

एक-दोन विषयात कमी आहेत,

पण …

पण आता अभ्यास करीन असं म्हणतोय..

 

बाबांच्या संतापाची धार बोथट होताना

मी पदराच्या आडून पाहायचो

हाताच्या मुठीत पदराचं टोक

घट्ट धरून !

 

त्या पदरानेच मला शिकवलं

कधी – काय – अन कसं बोलावं

 

तरुणपणी जेव्हा पदर

बोटाभोवती घट्ट गुंडाळला

तेव्हा त्याची खेच बघून

आईने विचारलंच,

“कोण आहे ती…

  नाव काय?”

 

लाजायलाही मला मग

पदरच चेहऱ्यापुढे घ्यावा लागला.

 

रात्री पार्टी करून आल्यावर …

जिन्यात पाऊल वाजताच, 

दार न वाजवता …

पदरानेच उघडलं दार.

कडीभोवती फडकं बनून …

कडीचा आवाज दाबून …

 

त्या दबलेल्या आवाजानेच 

नैतिकतेची शिकवण दिली

 

पदराकडूनच शिकलो सहजता

पदराकडूनच शिकलो सौजन्य

पदराकडूनच शिकलो सात्त्विकता

पदराकडूनच शिकलो सभ्यता

पदराकडूनच शिकलो सहिष्णुता

पदराकडूनच शिकलो सजगता

 

काळाच्या ओघात असेल,

अनुकरणाच्या सोसात असेल

किंवा

स्वतःच्या “स्व”च्या शोधात असेल,

 

साडी गेली…

ड्रेस आला

पँन्ट आली…

टाॅप आला

स्कर्ट आला…

आणि छोटा होत गेला

 

प्रश्न कपड्याचा नाहीच आहे ,

प्रश्न आहे तो, आक्रसत जाऊन ,

गायब होऊ घातलेल्या पदराचा !

 

कारण पदर हे पद नसून , जन्मभराची फक्त आणि फक्त  जबाबदारी आहे . आणि ती जाणीवपूर्वक व नि:स्वार्थपणे – पेलू शकते केवळ आई !

 

खरं तर – शर्टालाही  फुटायला हवा होता पदर …

पण खरं सांगू … शर्टाला तो झेपणार नाही!

कवी : श्री.सुरेंद्र पाटणेकर

संग्राहिका : सौ. दीप्ती गौतम

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘शब्दकळा…’ – लेखिका : श्रीमती अरुंधती ☆ प्रस्तुति – सौ. शामला पालेकर ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ ‘शब्दकळा…’ – लेखिका : श्रीमती अरुंधती ☆ प्रस्तुति – सौ. शामला पालेकर

सूनबाईंनी घासून ठेवलेली देवाची उपकरणे सासूबाई पुसून ठेवत होत्या. मधेच म्हणाल्या, “ अगबाई ! आज निरांजन नुसतंच कुरवाळलेलं दिसतंय ! “ बी. ए. मराठी असलेल्या सूनबाईंना वाक्याचा अर्थ कळायला अंमळ वेळच लागला. अर्थ लागला तेव्हा हसू आणि राग या दोन्हीचं मिश्रण असलेला एक वेगळाच भाव चेह-यावर उमटला. सासूच्या उत्कृष्ट मराठीला दाद द्यावी की चूक काढली म्हणून फणकारा दाखवावा हे तिला कळेचना !

मराठी भाषा फार मजेशीर आणि संपन्न – समृद्ध आहे. तिचा वापर पूर्वीच्या न शिकलेल्या, कमी शिकलेल्या स्त्रिया फार चतुराईने करत. ‘ शर्करा अवगुंठित’ शब्दांचा वापर लीलया होत असे.

आमचे एक परिचित होते. घर म्हणजे नांदतं गोकुळ. मुलांच्या दंग्यानं अन् पसा-यानं तिथल्या आजी कावलेल्या असत. ‘ आवरलेलं घर ‘ हे दृष्य फक्त सणावारी किंवा कोणी पाहुणा येणार असेल तरच. कधी त्यांच्या घरी डोकावलं तर आजी नातवंडांना ओरडताना दिसत. पसा-यात बुडालेल्या आजी सहज बोलून जात, “ कार्टी बसतील तिथे * ठेवतात ! “ हे वाक्य तेव्हा मला मजेशीर वाटायचं. आजवर ते लक्षात असूनही वापरायचा धीर मात्र होत नाही.

माझी एक धष्टपुष्ट मैत्रीण कामावरुन येताना जिमला जाऊन येत असे. त्या दिवशी तिच्याशी जरा बोलायचं होतं म्हणून साधारण ती येण्याच्या जरा आधीच मी तिच्या घरी गेले. तिच्याकडे सासूबाई आणि आजेसासूबाई अशा दोघीही होत्या. सासूबाई साधारण सत्तरीच्या. मैत्रिणीला यायला थोडा उशीर होणार होता. त्यामुळे सासूबाई भराभर कामं उरकत होत्या. मी आपलं सहज म्हटलं “ काकू, तुम्ही अजूनही फिट आहात अगदी !” लगेच आजी उद्गारल्या “ काय करणार बाई, तरण्या झाल्या बरण्या अन् म्हाता-या झाल्या हरण्या! “ मी उगीच अंग चोरुन अन् सावरून बसले.

म्हणी अन् वाक्प्रचारांचा वापर करावा तर तो मागच्या पिढीनेच. फारशा शिकलेल्या नसूनही या स्त्रिया सुसंस्कृत आणि प्रसंगी असंस्कृत भाषाही वापरत असत !

वेगळ्या अर्थानं गाजलेल्या एका ओळखीतल्या मुलीचं लग्न तशाच अर्थानं गाजलेल्या मुलाशी झालं, तेव्हा माझी आजी सहज बोलून गेली “ हडळीला नव्हता नवरा अन् झोटिंगाला नव्हती बायको ! आता जोडी छान जमली. “

आजोळी पूर्ण सुट्टी घालवल्यानंतर ( तेव्हा उन्हाळा आणि दिवाळीच्या सुट्टीत कुठले टूर किंवा ट्रीप्स नसायच्या. कधी वडिलांच्या मूळ गावी, कधी आईच्या माहेरी मुक्काम. हाच बदल. ) जूनमधे शाळेत गेले. पहिला दिवस, मराठीच्या बाई वर्गात आल्या. गप्पा टप्पा सुरु झाल्या. मधेच हसत हसत माझ्याकडे बघून म्हणाल्या “ वा ! गालांवर अगदी रुई फुललीय ! “ क्षणभर मी गोंधळले आणि मग अर्थ कळून रुईतच खुद्कन हसले होते.

अगदी शेलक्या शब्दात उल्लेख करायला मराठी भाषेत उदंड शब्दसमूह आहेत. आमच्या नात्यातल्या एका मुलीचं लग्न जमायला जरा अवघड जात होतं कारण काय ? तर म्हणे “ म्हशीनं पाय दिलाय ना नाकावर !” गोरीपान मुलगी असेल आणि तिचा नक्षा जर कुठलं वाक्य उतरवत असेल तर “ पांढरी पाल तर आहे, रंग काय चाटायचाय ! “ अत्यंत आळशी पुरुषाचा उल्लेख सहजपणे “ दिवसभर शेणाच्या पो सारखा पडलेला असतो, “ असा होई. खरं तर वरची वाक्यं मनं दुखावणारी नाहीत का ? पण आमच्या आसपासचा स्त्रीवर्ग सहजपणे हे बोलून जाई. ऐकणा-याला पण फार खेद खंत वाटत नसे.

चांगलं पण बोललं जाई बरं का ! एखादी मुलगी सुदृढ असेल तर “ अहो, दहा जणांचं कुटुंब हसत सांभाळेल “ एखादीसाठी “इतकी रूपवान आहे की वाटेवरचा चोरसुद्धा उचलून नेईल “ (म्हणजे काय म्हणायचे असेल? ) कोणी सुग्रण असेल तर “ अहो, पुरणपोळी विरघळते तोंडात, पाण्याला फोडणी दिली ना तरी ओरपत बसाल !”

आताच्या काळात एखादी स्त्री ‘ब्युटीफुल, गॉर्जियस ‘ दिसत असेल. तेव्हा ‘चारचौघींसारखी ‘, ‘ दहाजणीत उठून दिसेल अशी ‘, ‘ लाखात एक’ असे उल्लेख असत आणि त्यावरून रूपाचा अचूक अंदाज येई.

अर्थात पुरुषवर्गही यातून सुटत नसे. शेलकी विशेषणं त्यांच्यासाठीही असत. ‘आग्यावेताळ’, ‘जमदग्नीचा अवतार’, ‘दुर्वास मुनी’, ‘पिंपळावरचा मुंजा’, ‘पाप्याचं पितर’, ‘लुंग्यासुंग्या’ वगैरे वगैरे ! बरं शब्दकोषात याचे अर्थ शोधायची गरजच नव्हती. आपलं ऐकणं आणि निरीक्षण यातून अचूक अर्थ कळे. ‘ फाटका इसम ‘ मात्र मी बरेच दिवस शोधत होते ! ‘मदनाचा पुतळा ‘ बापकमाईवर जगत असेल तर त्याला शून्य किंमत होती. अचूक शब्दांचा अचूक जागी उपयोग करायला तीक्ष्ण बुद्धी लागते. शाळा कॉलेज फारसं न पाहिलेल्या त्या पिढीकडे ती होती.

गॉसिपिंग त्याही काळात होतंच. घरातल्या ज्येष्ठा व्हरांड्यात, ओट्यावर, अंगणातल्या बाजांवर निवडण टिपण करत मस्त वेळ घालवत. “ हातपाय लुळे अन् जीभ चुरुचुरु वळे “ असं माझी आजी म्हणे. अशा गप्पांचा उल्लेख कोणी उखाळ्या पाखाळ्या काढणे असाही करे !

ही अशी खमंग, लज्जतदार, मर्मभेदी, वर्मभेदी, कधी सभ्य असूनही असभ्य भासणारी मराठी भाषा आमच्या पिढीतच लुप्त होऊ लागली होती. आता तर ती परोठे, ठेपले, पिझ्झा, बर्गरच्या संस्कृतीत विलीन झाली आहे. आंग्लाळलेल्या मराठीत तो ठसकाच नाही, ती मज्जा नाही ! पिढीगणिक भाषा बदलत जाते. ‘ ती व्यक्ती’ चा ‘ तो व्यक्ती ‘ कधी झाला समजलं तरी का ? आज प्रसिद्धीमाध्यमांवर जे मराठी बोललं जातं, ते ब-याचदा अनाकलनीय असतं. “ ** पण नांदा “ ! भाषा जिवंत राहायलाच हवी ! सगळ्याचं मिश्रण असलेली भेळ नाही का आपण आवडीनं खातो. तसंच, ही मराठी पण आपलीच आहे, नाही का ?  

लेखिका: श्रीमती अरुंधती

प्रस्तुती : सौ. शामला पालेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ज्याची खावी भाकरी त्याची करावी चाकरी – लेखक : श्री सतीश वैद्य ☆ प्रस्तुती – सौ. सुचिता पंडित ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ ज्याची खावी भाकरी त्याची करावी चाकरी – लेखक : श्री सतीश वैद्य ☆ प्रस्तुती – सौ. सुचिता पंडित ☆

सोलापुरी भाकरी, हा खरं तर संशोधनाचा विषय आहे. शेंगा चटणीचा बोलबाला खूप होतो, पण बिचाऱ्या भाकरीला कोणी विचारत नाही. जोंधळ्याची, म्हणजेच ज्वारीची भाकरी ही तब्येतीला खूप चांगली असते, असं काही डॉक्टर सांगतात. इथेही पुन्हा डाव्या विचारसरणीचे डॉक्टर्स ” ज्वारी हा पिष्टमय पदार्थ असल्याने त्या मुळे शुगर वाढते ! ” असं ठणकावून सांगतात.

भाकरी ही पौर्णिमेच्या चंद्रासारखी असावी, तिच्यावर चंद्रावर असलेली हरणांची जोडी असावी ( थोडी जास्त भाजल्यावर ती करपते ).

गोल भाकरी करणे ही सुद्धा एक कला आहे. भाकरी करताना एक प्रकारे तीनताल वाजतो, धा s धा s धा s धा, भाकरी फिरवली जाते पुन्हा धा s धा s धा s धा. धिं हे अक्षर जरी वाजत नसलं तरी, मात्रा मात्र बरोबर असतात. अशा तीनतालात ज्या बायका भाकरी करतात, त्यांच्या भाकऱ्या सुंदर होतात. माझी मोठी बहीण अश्विनी देशपांडे हिने केलेली भाकरी खरंच सुंदर असते.

आमचे जगन्मित्र गुरुसिद्धय्या स्वामी ह्यांची एक बहीण बाळीवेसेत राहते. तिच्याकडे आम्ही एकदा जेवायला ( खास भाकरी खायला ) गेलो होतो. भाकरीतली वाफ आणि त्याच्या पापुद्र्यातले हाताला बसणारे चटके खात, भाकरी खाणे, हा विलक्षण योग तिथे आला. बिचारीचा प्रेमळपणा पण इतका, की पहिली भाकरी खाता खाता ताटात थंड होते, म्हणून ” ती अर्धी बाजूला ठेवा, ही दुसरी खावा ” भावावर असणारी मृदू माया आणि हाताला चटके देणारा हा ‘भाकरी योग’ आयुष्यभर लक्षात राहिला.

तसं सोलापूरच्या लोकांना भाकरीचं फार कौतुक नाहीये, कारण बहुतेक सोलापूरच्या घराघरांतून अशा भाकरी करणाऱ्या खूप माऊली आहेत. भाकऱ्या बडवण्यासाठीच आपला जन्म आहे, अशी सुद्धा काहीजणींची भावना आहे.

दोन वेळची चटणी भाकरी मिळाली की माणूस खूश होतो. खारब्याळी, रोट्टी आणि शेंगा च्यटणी साधं सोप्पं जेवणाचं गणित. त्यामुळे प्रॉपर सोलापुरी माणूस बाहेर फारसा जातही नाही आणि रमत देखील नाही.

” भाकर तुकडा खाल्ला का न्है अजुक ?” म्हणजे ‘जेवण झालं की नाही ?’ असं विचारलं जातं. पोळी म्हणजे ती फक्त पुरणाची, साधी पोळी म्हणजे ” चपाती “

एकंदरीतच पोळी, भाकरी, पुरणपोळी, धपाटे आणि थालीपीठ हे पदार्थ, अस्सल तबलावादकाने वाजविलेल्या कायद्यासारखे असतात. एकही मात्रा इकडची तिकडे होत नाही. हळू हळू भाकऱ्या खाणारे ( आता दीड भाकरी सकाळी दीड संध्याकाळी ) कमी होत चालले, तशी बायकांची भाकरी करायची सवयदेखील मोडायला लागली.

पुरुष जे जे काही करू शकतात, ते ते बायका करू शकतात, पण बायका जशी भाकरी करतात तशी भाकरी, पुरुष कधीच करू शकत नाहीत. पोळ्या करणारे पुरुष आहेत. पण ते फक्त भाजण्याची क्रिया करू शकतात. बाकी पोळी लाटणे आणि भाकरी थापणे यावर बायकांची अजूनतरी मक्तेदारी आहे.

आता भारतातून अमेरिकेत गेलेली मुलं, यू ट्यूब बघून किंवा आयांना विचारून पोळ्या करतात, पण भाकरीच्या कुणी मागे लागत नाही. अगदी सांगायचं झालं तर अजून शहरातल्या पोरीसुद्धा भाकरीच्या नादी लागत नाहीत.

मावळात तांदळाची भाकरी करतात, डोसा किंवा दावणगिरी डोसा, स्पंज डोसा, (निर डोसा, ज्याला खूप निऱ्या असतात) यांची महाराष्ट्रातील मावस बहीण म्हणजे, मावळातली तांदळाची भाकरी.

जानेवारी महिन्यात संक्रांतीच्या वेळेला तयार होणारी भाकरी म्हणजे बाजरीची भाकरी. स्वभावाने खूपच तापट असते, म्हणून फक्त भोगीच्या दिवशीच फक्त तिला वापरतात. पुण्याच्या परिसरात भाकरी म्हणजे बाजरीचीच, ज्वारीची पाहिजे असल्यास सांगावं लागतं, जसं मराठवाड्यात स्टेट बँक म्हणजे, स्टेट बँक ऑफ हैदराबाद, स्टेट बँकेला इंडिया बँक असं म्हणतात तसं.

भाकरीची अनेक भावंडं आहेत, सगळ्यात लहान आणि खूप खोडकर भाऊ ज्याला आई पाठीत जास्त धपाटे घालते, तो ‘धपाटे’.

आता पुण्या मुंबईत ‘ लोणी धपाटे ‘ या नावाने काहीही विकलं जातं. नुसता तेलात डाळीचा बॅटर घालून तव्यावर भाजणे म्हणजे, धपाटे नसतात रे sss !

धपाटे का करावे ? पूर्वी सोलापूरहून पुण्याला यायचं म्हणजे प्रवासात किमान दोन जेवणं व्हायची ( हीच लाल परी आठ आठ तास घ्यायची पुण्यात पोचायला, विजापुर औरंगाबाद तर सकाळी सहा वाजता विजापुरहून निघाली की, संध्याकाळी सहा वाजता कशीबशी औरंगाबादला पोचायची. दोन ड्राइव्हरच्या झोपा व्हायच्या. त्यामुळे प्रवासात जेवण्यासाठी या धपाट्यांचा शोध लावलाय, आपल्या हुशार पूर्वजांनी. जास्त वेळ टिकावा आणि त्यासोबत शक्यतो तोंडी लावायला कशाची गरज पडू नये, ही त्यावेळची गरज होती.

थालीपीठ हा देखील भाकरीचा भाऊच. करणाऱ्या सुगरणीच्या बोटांचे ठसे आणि चार छिद्रमय थालीपीठ किती लोकांच्या नशिबात आहे काय माहीत ! मला तरी थालीपिठाचा पृष्ठभाग चंद्रावर असलेल्या जमिनीसारखा वाटतो. त्यात तेल आतपर्यंत मुरावं म्हणून केलेली छिद्रे ही चंद्रावरच्या फोटोत दिसलेल्या जमीनीसारखी वाटतात.

पुण्यात हॉटेलात मिळणारी थालीपीठ ही खाद्य वस्तू, म्हणजे मर्तुकडी आणि हडकुळ्या माणसासारखी भासतात. थालीपीठ कसं लुसलुशीत असायला हवं, आता कशाच्याही नावावर काहीही विकतात आणि आपण ते खातो ( घरी करायला नको, म्हणून त्यालाच चांगलं म्हणून मोकळेही होतो. )

आता काही ठिकाणी मल्टिग्रेन नावाचं एक आभूषण ह्या सगळ्या खाद्य पदार्थांवर आलंय. हेल्थ कॉन्शस लोक अशा नवनवीन कल्पना शोधून काढतात. तशी मल्टिग्रेन थालीपीठ मिळतील. गिरणीत सांडलेली सगळी पिठं एकत्र करून त्यांचं थालीपीठ म्हणजे मल्टिग्रेन थालीपीठ.

मक्याची पण भाकरी करतात. ती कधी फारशी खाण्यात आली नाही. ती थोडीफार पंजाबात लग्न होऊन गेलेल्या बहिणीसारखी गलेलठ्ठ आणि तिच्या सोबत ” बरसोंका साग ” बरसो से खाते हैं इसलिये, सरसोंका च्या ऐवजी बरसोंका !

रोठ हा देखील भाकरी सदृश पदार्थ. इकडे विदर्भात तर, एके दिवशी पोळ्याभाकरी करताना नवऱ्याशी भांडण झालं आणि बायको चिडली, ” मी नाही पोळ्याभाकरी करणार ” असं म्हणून, तिने पोळ्या करायला केलेले गोळे, रागारागाने दिले चुलीत फेकून आणि गेली निघून बाहेर. नवऱ्याला लागली होती कडक भूक, त्याने ते चुलीतले गोळे काढले बाहेर आणि त्यावरची राख फुंकून घातले वरणात, ते गोळे झाले कडक म्हणून त्यावर भरमसाठ तूप घातलं, त्याला ते इतकं आवडलं की तो एक नवीन पदार्थ तयार झाला. त्याचं नाव दाल भाटी. खरं तर तो तेव्हा पुटपुटला होता ” दाल भागी ” म्हणजे बायकोने गोळे दाल दिये चुल्हे में और भाग गयी. पुढे त्याचा अपभ्रंश झाला आणि दाल भाटी तयार झाली असावी, असा माझा अंदाज आहे बरं का !

‘वरण फळं ‘, ‘चकोल्या ‘अशा नावाचा पण एक पदार्थ महाराष्ट्र आणि विदर्भात जास्ती दिसतो. ” रोज रोज काय मेलं त्या पोळ्या भाजायच्या, असं म्हणून एखाद्या गृहिणीने, शेजारच्या गॅसवर उकळत्या आमटीत लाटलेल्या पोळ्यांचे तुकडे टाकले आणि झाली वरण फळं तय्यार ! वरून लसणीची फोडणी, खोबरं वगैरे साज शृंगार नंतर केला गेला असावा.

अरेच्या ! भाकरीपासून झालेली सुरुवात बघा कुठे कुठे पोचली, सगळ्यात शेवटी काय ? तर असेल चाकरी तर मिळेल भाकरी, किंवा बहिणाबाईंच्या ओळी तर जगप्रसिद्ध आहेतच,

अरे संसार संसार, जसा तवा चुल्ह्यावर

आधी हाताला चटके, तेव्हा मिळते भाकर.

लेखक : सतीश वैद्य

 फोन नं. : 9373109646

प्रस्तुती :सौ. सुचिता पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “मैत्रीचं झाड…” – कवी: अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाडकर्णी-नाईक ☆

सौ. शशी नाडकर्णी-नाईक

? वाचताना वेचलेले ?

☆ “मैत्रीचं झाड…” – कवी: अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाडकर्णी-नाईक 

मैत्रीच्या थोड्या बिया

मला एकदा मिळाल्या

जिथे जिथे राहिले मी

तिथे लावून टाकल्या…

*

जेव्हा जेव्हा जाते तिथे

वाढलेली पानं डोलतात

वाकून वाकून माझ्याशी

दोन शब्द तरी बोलतात…

*

आनंदाने सांगतात झाडं

सुखदुःखाच्या कथा

विसरुन जाते मी

माझ्या मनीच्या व्यथा…

*

रोज कोवळी पालवी

अलवार फुटत जाते

तसेच नाते या मैत्रीचे

मनामध्ये रुजत जाते…

*

प्रत्येक झाडाच्या सयी

मनात ठेवल्या साठवून

कधी एकटी असताना

सोबत होते आठवून…

*

एक झाड असेल माझं

तुमच्या शेजारी कदाचित

जमलं तर वाढवा त्याला

भेटेन मी त्यात अवचित !

कवी : अज्ञात 

प्रस्तुती : सौ. शशी नाडकर्णी-नाईक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर

Please share your Post !

Shares