मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ मी पाहिलेली जगातील सर्वात सुंदर भिंत. ☆ प्रस्तुती – श्री विनय माधव गोखले

? वाचताना वेचलेले ?

☆ मी पाहिलेली जगातील सर्वात सुंदर भिंत ☆ प्रस्तुती – श्री विनय माधव गोखले ☆ 

(एक बोधकथा)

इटलीमधील व्हेनिस शहरातील एका कॉफी शॉपमध्ये मी मित्रांसोबत बसलेलो होतो.आम्ही गप्पा आणि कॉफीचा आस्वाद घेत होतो. तेवढ्यात एक माणूस आला आणि आमच्यासमोरील टेबलवर बसला. त्याने वेटरला बोलवले आणि ऑर्डर दिली.” दोन कॉफी….एक माझ्यासाठी आणि एक त्या भिंतीसाठी !”

माझ्या मनात उत्सुकता निर्माण झाली. मी त्या व्यक्तीकडे पाहू लागलो. वेटरने त्याला एकच कॉफी आणून दिली. बिल मात्र दोन कॉफीचे होते. त्या व्यक्तीने दोन कॉफीचे बिल दिले आणि तो निघून गेला. लगेच वेटरने एक चिठ्ठी भिंतीवर चिटकवली आणि ओरडला, ‘ एक कॉफी ऑफ कप.’

आम्ही तिथेच गप्पा मारत बसलो. तेवढ्यात आणखी दोघेजण तिथे आले. त्यातील एकाने तीन कॉफीची ऑर्डर दिली. दोघांनी एक-एक कॉफी घेऊन तीन कॉफीचे पैसे दिले. मग पुन्हा वेटरने काहीतरी लिहिलेला कागदाचा एक तुकडा तिथे चिटकवला आणि पुन्हा तेच ओरडला. आमच्यासाठी हे एक नवलच होते. आम्ही कॉफी संपवली आणि बिल देऊन बाहेर पडलो.

काही दिवसांपूर्वी पुन्हा एकदा त्याच कॉफी शॉपमध्ये जाण्याचा योग आला. आम्ही कॉफीचा स्वाद घेत असतानाच एक गरीब दिसणारी व्यक्ती आली आणि समोरील टेबलावर बसली. त्या व्यक्तीने वेटरला सांगितले की,”  वन कप ऑफ कॉफी फ्रॉम द वॉल.”

त्या वेटरने नेहमीच्याच अदबीने त्या व्यक्तीला कॉफी दिली. त्या व्यक्तीने कॉफीचा आस्वाद घेतला आणि बिल न देताच ती व्यक्ती निघून गेली.

हे सगळे पाहून आम्ही आश्चर्यचकीत झालो होतो. तेवढ्यात त्या वेटरने भिंतीवर चिटकवलेला कागदाचा तुकडा काढून डस्टबिनमध्ये टाकून दिला. या शहरातील गरीबांनाही कॉफीचा आस्वाद घेता यावा यासाठी कुणीतरी काळजी घेणारे होते. ती काळजी अतिशय आदराने आणि कुणालाही कळणार नाही अशा पद्धतीने घेतली जात होती. त्या गरीबाच्या प्रतिष्ठेला कुठेही धक्का लागणार नाही याची पुरेपूर काळजी घेण्यात आली होती.

नकळत आमचे डोळे पाणवले. कारण ज्या गरिबाला कॉफी प्यावीशी वाटली होती, तो खिशात पैसे नसतांनाही आला होता. त्याला कुणाकडेही हात पसरावे लागले नाहीत, किंवा कुणाकडेही याचना करण्याची वेळ आली नाही. एवढेच काय, हे दान कुणी दिले याचीही त्याला कल्पना नव्हती. त्याचवेळी देणाऱ्यालाही आपले दान कुणाला जाणार याची कल्पना नसते; पण त्याला नक्की ठाऊक असते की हे सत्पात्री दान आहे.

—–खरंच बोध घेण्यासारखी कथा. 

प्रस्तुती : श्री विनय माधव गोखले

भ्रमणध्वनी – 09890028667

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ मी मोक्षगुंडम् विश्वेश्वरय्या – भाग-2 – प्रज्ञावंत देवळेकर ☆ प्रस्तुती – श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

?  वाचताना वेचलेले ? 

☆ मी मोक्षगुंडम् विश्वेश्वरय्या – भाग-2 – प्रज्ञावंत देवळेकर ☆ प्रस्तुती – श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

(त्यांनी धरणाच्या भिंतीजवळ विहिरीसदृश्य गोलाकार संरचना केली आणि त्यांना स्वयंचलित दरवाज्यांशी जोडलं आणि दरवाजे धरणाच्या भितींच्या आत बसवले..)

इथून पुढे —-

यातल्या १७१ दरवाज्यांपैकी ४८ लोखंडी दरवाजे भद्रावतीच्या पोलाद कारखान्यात बनवले होते.  आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे या प्रत्येक दरवाज्यावर दहा टनांचा भार असूनही ते स्वत: वर खाली होऊ शकत होते..

जेव्हा जलाशयात पाण्याची पातळी वाढायची, तेव्हा पाणी विहिरीत पडायचं, ज्यामुळं विहिरीची पातळी वाढून स्वयंचलित दरवाजे आपोआप उघडून जायचे आणि अतिरिक्त पाणी निघून जायचं अन् विहिरीची पातळी जशी कमी व्हायची तसे दरवाजे आपोआप बंद होऊन पाण्याचा प्रवाह थांबत होता..

संपूर्ण जगभरात असं अभिनव तंत्र पहिल्यांदाच वापरलं जात होतं.  याची नंतर युरोपासह इतर अन्य देशात काॅपी झाली..

‘ धरणाची उंची न वाढवता त्याची जलक्षमता वाढवणं ’ ही कल्पना कुणाच्या स्वप्नात देखील आली नसेल पण विश्वेश्वरैय्यांनी ते करून दाखवलं– ते ही इथं पुण्यातल्या खडकवासल्यात..

‘मुठा’ नदीच्या पुराला नियंत्रित करण्यासाठी त्यांनी खडकवासला धरणावर पहिल्यांदाच स्वयंचलित दरवाज्यांचा प्रयोग केला होता..या प्रयोगाचं त्यांनी पेटंटही घेतलं होतं..

धरण निर्मितीसोबतच विश्वेश्वरैय्यांनी देशाच्या औद्योगिक विकासातही भरीव असं योगदान दिलं..

धरण आलं तशी वीज आली– आणि जशी वीज आली तसे उद्योगधंदे बहरू लागले..

औद्योगिकीकरणाचे खंदे समर्थक असल्यानं त्यांनी बंगलोर इथं “ भारतीय विज्ञान संस्थान “ या ठिकाणी धातूकाम विभाग–वैमानिकी–औद्योगिक वहन आणि अभियांत्रिकी, अश्या अनेक विभागांची पायाभरणी केली..

औद्योगिकीकरणास त्यांचा फक्त ढोबळ पाठिंबा नव्हता.  यामागं देशांतर्गत अशिक्षितपणा-गरीबी-बेरोजगारी-अनारोग्य याबाबत मूलभूत असं चिंतन होतं..

उद्याेगधंद्यांचा अभाव–सिंचनासाठी मान्सूनवरची अवलंबिता–पारंपरिक कृषी पद्धती–प्रयोगांची कमतरता– यामुळं विकासात येणारा अडथळा रोखण्यासाठी त्यांनी अहोरात्र परिश्रम करत आपल्या कार्यकाळात म्हैसूर राज्यातल्या शाळांची संख्या ४५०० वरून १०,५०० पर्यंत नेली.  फलस्वरुप विद्यार्थ्यांची संख्या १,४०,००० वरून ३,६६,००० पर्यंत वाढली..

मुलींसाठी स्वतंत्र वसतीगृहासोबतच पहिलं फर्स्ट ग्रेड काॅलेज सुरू करण्याचं श्रेयही त्यांचंच..

सोबत म्हैसूर विद्यापीठाच्या स्थापनेत त्यांचा सिंहाचा वाटा होता..

हुशार मुलांना परदेश शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, शेतकी–अभियांत्रिकी–औद्योगिक प्रशिक्षणासाठी महाविद्यालये, यासाठी त्यांनी दूरगामी नियोजन केलं..

“ उद्योगंधदे म्हणजे देशाची जीवनरेखा “ असं मानत त्यांनी रेशम-चंदन-धातू-स्टील– अश्या उद्योगांना जर्मन आणि इटालियन तंत्रज्ञांच्या मदतीनं विकसित केलं..

त्यांची धडपड आणि आशावाद निव्वळ स्वप्नाळू होता असं नाही.  तर ‘फंड’ हे वास्तव ध्यानात घेऊन त्यांनी बॅंक ऑफ म्हैसूरची मुहूर्तमेढ रोवली..

तब्बल ४४ वर्षे सक्रिय सेवा देऊन १९१८साली विश्वेश्वरैय्या लौकिकार्थानं निवृत्त झाले, तरी त्यांनी समाजजीवनातलं आपलं काम सोडलं नाही.  किंबहुना अडीअडचणीला भारतीय अभियंत्यांना प्रशिक्षित करून अनेक बंद पडलेली कामं मार्गी लावली..

म्हैसूरमध्ये ऑटोमोबाईल आणि एअरक्राफ्ट फॅक्टरीचं स्वप्न बघत त्यांनी एचएएल आणि प्रिमिअर ऑटोमोबाईलचं बीज पेरलं आणि निवृत्तीनंतरही बख्खळ काम करून ठेवलं..

आपल्या आयुष्यात असंख्य बहुमानांनी सन्मानित झालेल्या त्यांना १९५५ साली वयाच्या ९५व्या वर्षी जेव्हा देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न’ जाहीर झाला तेव्हा त्यांनी तत्कालिन पंतप्रधान पंडित नेहरूंना एक पत्र लिहिलं,– ” मला या उपाधीनं सन्मानित केलं म्हणून मी तुमचं कौतुक करेन अशी अपेक्षा तुम्ही बाळगलीत, तर तुमच्या पदरी निराशा पडेल..मी सत्यांच्या मुळाशी जाणारा माणूस आहे ”

नेहरूंनी त्यांच्या या पत्राची प्रशंसा करत त्यांना “ राष्ट्रीय घडामोडींवर बोलणं–शासकीय धोरणांवर टीका करण्याचं स्वातंत्र्य नेहमी अबाधित असेल..पुरस्कृत करणं म्हणजे शांत बसवणं नव्हे ”—

असं उत्तर दिलं..

वयाची शंभरी उलटल्यानंतरही विश्वेशरैय्या कार्यमग्न राहिले आणि १४ एप्रिल १९६२ या दिवशी रुढार्थानं हे जग कायमचे सोडून गेले असले, तरी इतिहासात त्यांचं नाव कायमचं कोरलं गेलं..

विश्वेश्वरैय्या हे ना जन्मानं महान होते,ना त्यांना कुठला दैदिप्यमान वारसा होता,ना हे महात्म्य त्यांचावर कुणी थोपवलं होतं..

कठीण परिश्रम–ज्ञानपिपासु वृत्ती–अथक प्रयत्न–समाजाभिमुख वर्तन,- यामुळं त्यांना हे ‘महात्म्य’ प्राप्त झालं होतं..

प्रचंड बुद्धिमान अभियंता आणि तितकेच कुशल प्रशासक असणाऱ्या विश्वेश्वरैय्यांचा जन्मदिन..

त्यांच्या सन्मानार्थ “ अभियंता दिन “ म्हणूनही साजरा केला जातो..

या ऋषितुल्य व्यक्तित्वाला विनम्र अभिवादन

समाप्त 

— प्रज्ञावंत देवळेकर 

संग्राहक – श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

चंद्रपूर

मो. 9822363911

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ मी मोक्षगुंडम् विश्वेश्वरय्या – भाग-1 – प्रज्ञावंत देवळेकर ☆ प्रस्तुती – श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

?  वाचताना वेचलेले ? 

☆ मी मोक्षगुंडम् विश्वेश्वरय्या – भाग-1 – प्रज्ञावंत देवळेकर ☆ प्रस्तुती – श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

गोष्ट आहे इथली भारतातलीच जेव्हा इथं इंग्रजांचं राज्य होतं..

कुठल्यातरी लोहमार्गावर प्रवाश्यांनी खच्चून भरलेली रेल्वे चालली होती आणि प्रवाशांत काही मोजक्या भारतीयांसोबत बरेचसे इंग्रज मंडळीही होते..

त्या रेल्वेच्या एका डब्यात साध्या पोशाखातला एक सावळासा शिडशिडीत तरुण प्रवासी शांतपणं खिडकीबाहेरचा निसर्ग न्याहाळत होता..

त्या तरुणाचं रंगरूप आणि कपडे बघून त्याला अडाणी समजणारे काही इंग्रज प्रवासी आपसात कुजबूज करत हसत होते..

‘आपल्यालाच हसतायेत’ हे ठाऊक असूनही तो साधा सावळा तरुण त्यांचाकडं लक्ष्य न देता आपल्याच विचारात दंग होता आणि हे बघून त्याच्याबद्दल कुजबूज करणारे जास्तच हसत होते..तेवढ्यात ‘त्या’ तरुणानं अचानक उभं रहात रेल्वेची साखळी खेचली..

एव्हाना रेल्वेनं वेग पकडला होता पण या तरुणानं साखळी ओढल्यानं रेल्वे अचानक थांबली..

‘ हा आपली तक्रार करतो की काय? याला इथं उतरायचं तर नसेल? वेडा तर नाही?’ सहप्रवाश्यांच्या मनात एक ना अनेक शंका डोकावल्या..

काहींनी तर त्याला बावळट,मूर्ख म्हणत शिव्याही घातल्या..

तेवढ्यात डब्यात गार्ड आला आणि त्यानं अंमळ रागातच विचारलं,” कुणी आणि का साखळी खेचली रे ?” 

साखळी खेचणारा साधासा तो तरुण पुढं आला– ‘ मी खेचली.’ त्याचं हे उत्तर ऐकून गार्डनं त्याला खालून वर न्याहाळलं आणि काही बोलणार तोच तरुण पुढं सांगू लागला,” मला वाटतं इथून साधारण काही फर्लांग अंतरावर रेल्वेचा रूळ तुटलाय.”

“ॲंऽऽ तुला इथूनच कसं कळलं बुवा? ” गार्ड अद्यापही रागातच होता..

“ महोदय..गाडीच्या नैसर्गिक वेगात थोडा फरक पडलाय आणि रुळांतून येणारा आवाजही मला काहीसा बदलल्यासारखा वाटतोय..ही धोक्याची घंटा आहे..”

“अच्छा एवढी हुशारी? चल बघूनच घेऊ”– म्हणत गार्ड त्या तरुणाला घेऊन डब्यातून खाली उतरला..

फर्लांगभर अंतरावर बघतो तर काय? एका ठिकाणी रुळाचा जोड खरोखरच निखळला होता, आणि नटबोल्ट इतस्तत: पसरले होते..

हे सगळं बघून इतर प्रवाश्यांचे अन् विशेषत: इंग्रजांचे तर डोळे पांढरे झाले..

त्या साध्याश्या तरुणाच्या समजदारीमुळं मोठा अपघात टळला होता..लोकं त्याचं कौतुक करू लागले..इंग्रजासोबतच गार्डलाही स्वत:ची क्षणभर लाज वाटली ‘आपलं नाव? ’ त्यानं अदबीनचं तरुणाला विचारलं..

“मी मोक्षगुंडम विश्वेशरैय्या..मी एक अभियंता आहे”

त्याचं नाव ऐकून सगळेच क्षणभर स्तब्ध झाले कारण या नावानं तोपर्यंत देशभरात ख्याती मिळवली होती..

लोकं त्या तरुणाची माफी मागू लागले..”अरे पण तुम्ही माफी का मागताय?” विश्वेश्वरैय्यांनी हसत विचारलं..

“ते..आम्ही..तुमची जरा खिल्ली..”

“ मला तर नाही बुवा काही आठवत. ” मंद स्मित करत विश्वेश्वरैय्यांनी सगळ्यांना लागलीच माफही करून टाकलं..

१८८३साली अभियांत्रिकी परिक्षा पहिल्या श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या विश्वेश्वरैय्यांचं पहिलं प्रेम ‘ स्थापत्य अभियांत्रिकी ’ अर्थात सिव्हिल इंजिनिअरींग..

आपल्या करीयरच्या पहिल्या काही वर्षातच —-

त्यांनी कोल्हापुर-बेळगाव-धारवाड-विजापूर-अहमदाबाद-पुणे, इथं शहरांसाठी राबवल्या जाणाऱ्या पाणीपुरवठा योजनेत भरपूर काम केलं..

१९०९ साली त्यांची म्हैसुर राज्याचा ‘ मुख्य अभियंता ‘ म्हणून नियुक्ती झाली.  सोबतच रेल्वेचं सचिवपदही मिळालं..

तिथं ‘कृष्णराज सागर’ धरणनिर्मितीत त्यांच्या योगदानाबद्दल भरपूर चर्चा झाली, कारण यामुळं प्रचंड मोठं क्षेत्र पाण्याखाली आलं होतं आणि वीजनिर्मितीसोबतच म्हैसुर-बंगलोर या शहरांना पाणीपुरवठाही झाला..

‘कृष्णराज सागर’ धरण विश्वेश्वरैय्यांच्या तांत्रिक कौशल्याचं अन् प्रशासकीय वकुबाचं प्रतीक ठरलं..

आता सोपं वाटत असेल, पण त्याकाळी इतकी मोठाली धरणं बांधणं तांत्रिकदृष्ट्या प्रचंड अवघड होतं..हायड्रोलिक इंजिनिअरींग तितकीशी विकसित नव्हती. आणि सगळ्यात मोठं आव्हान तर सिमेंटचं होतं..इतकं सिमेंट आणायचं कुठून? तेव्हा देश याबाबतीत संपूर्णपणे आयातीवर अवलंबून होता. आणि थोडक्यात सांगायचं तर ऐपतही नव्हती..

जलाशयात पाणी नियंत्रित करण्यासाठी विश्वेश्वरैय्यांनी पुस्तकापलिकडं जात विशेष तांत्रिक प्रयोग केले..त्यांनी धरणाच्या भिंतीजवळ विहिरीसदृश्य गोलाकार संरचना केली आणि त्यांना स्वयंचलित दरवाज्यांशी जोडलं, आणि दरवाजे धरणाच्या भितींच्या आत बसवले..

क्रमशः….

— प्रज्ञावंत देवळेकर 

संग्राहक – श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

चंद्रपूर

मो. 9822363911

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ यमाssss (कविता)….प्रमोद जोशी ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

?  वाचताना वेचलेले ? 

☆ यमाssss (कविता)….प्रमोद जोशी ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

यमा, तुलाच फाशी द्यावी,

एवढा मोठा आहे गुन्हा !

बिपिन रावतांसारखी माणसं,

होत नाहीत पुन्हा-पुन्हा !

 

हेवा एवढा वाटला का रे?

नृसिंहाची बघून धमक !

काळालाही भिती वाटेल,

अशी नजरेमधे चमक !

 

इतके पर्याय असतानाही,

सुगंधावर टाकलास फास?

खादी नाले-डबकी आहेत,

त्याना केवढा कुबट वास !

 

बघ अख्खा देश यमा,

वीरासाठी करतोय शोक !

वाटलं नव्हतं क्रूरतेचं,

एवढं कधी गाठशील टोक !

 

वाचवणाराच नेऊन यमा,

केवढं मोठं केलंस पाप !

घरी जाशील तेव्हा कळेल,

बाप तुला देतोय शाप !

 

देवानीच का आदेश काढला?

स्वर्गच निर्धोक व्हावा म्हणून !

तिथला मुख्य सेनानीही,

बिपिन रावत हवे म्हणून?

 

सावित्री तर आजचीसुद्धा,

सत्यवानासोबत गेली !

चिरंजीवच हळद-पिंजर,

आठवणीनं सोबत नेली !

 

इथल्या मातीमधले संस्कार,

इथल्या मातीमधलं शौर्य !

चोरून नेमकं केलंस काय?

सिद्ध केलंस आपलंच क्रौर्य !

 

 -प्रमोद जोशी, देवगड.

9423513604

संग्राहक – मंजुषा सुनीत मुळे 

९८२२८४६७६२

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ विस्मरणात चाललेला ग्रामीण शब्दसंग्रह ☆ संग्राहक – श्री माधव केळकर

?  वाचताना वेचलेले  ? 

☆ विस्मरणात चाललेला ग्रामीण शब्दसंग्रह ☆ संग्राहक – श्री माधव केळकर ☆

ग्रामीण भागातील दैनंदिन जीवनात सहजपणे वापरल्या जाणाऱ्या, मराठी भाषेला समृध्द 

करणाऱ्या, पण  काळाच्या ओघात काहीशा विस्मृतीत गेलेल्या शब्दांचा, संकल्पनांचा मागोवा—-

                      

जसजसं शेतीवाडीचं  यांत्रिकीकरण होऊ लागलं , गावगाड्याला नागरीकरणाने भरकटून टाकलं,   गावाकडचं घर बदललं आणि ‘बंगलो स्किम’ आली, तसतसे मग –

 

ओटा,       पडवी,        न्हाणीघर,      माजघर,      शेजघर,      माळवद,         धुराडे-धारे,

वासं-आडं,       लग,       दिवळी,       खुंटी,     फडताळ,      परसदार,         पोतेरं, 

चावडी,     चौक,      पार,     पाणवठा,   उंबरठा,     कडी कोंडी,     खुराडं,    उकिरडा, 

——-हे शब्द विस्मरणात गेले.

 

बैलगाडी जाऊन ट्रॅक्टर-यांत्रिकी अवजारं आल्यानं —-

 

औत,   रूमणं,    चाडं,    लोढणा,     वेसण,     झूल,    तिफण,     जू,    वादी, 

कासरा (लांब दोर),        दावं (लहान दोरखंड),     चराट (बारीक दोरी) 

——-या शब्दांना आपण हरवून बसलो. 

 

विहिरीवरची मोट गेली, पंप आले. परिणामी—-

 

 मोट,    नाडा,    शिंदूर,    धाव,   दंड,   ओपा,     पलान 

——–हे शब्द दिसेनासे झाले. 

 

खुरपणी,    मोडणी,     मोगडणी,    उपणणी,    बडवणी,    खुडणी,    कोळपणी, 

दारं धरणं,     खेट घालणं,      माळवं

——- यांचा अर्थ अलीकडच्या पिढीला समजत नाही. 

 

रास,    सुगी,   गंजी,   कडबा,   पाचुंदा,   बोंडं,   सुरमाडं,   भुसकट,   शेणकूट,   गव्हाण

——- या शब्दांचंही तसंच! 

 

धान्य दळायचं— दगडी जातं,   खुट्टा,   मेख,

——–हेही शब्द काळाच्या पडद्याआड चाललेत.

            

साळुता आणि केरसुणी– याऐवजी झाडू आला. 

 चपलेला— पायताण, 

गोडेतेलाला— येशेल तेल, 

टोपडय़ाला—- गुंची म्हटलं जायचं, 

———हे आता सांगावं लागतं.

 

गावंदर,    पाणंद,    मसनवाट

——हे असे शब्द नागरीकरणामुळं मागं पडले. 

 

चांभाराची रापी,      सुताराचा वाकस,      कुंभाराचा आवा, 

लोहाराचा भाता,      ढोराची आरी,          बुरूडाची पाळ्ळी

——ही हत्यारांची नावं आता कुणाला आठवतात? 

 

पतीला दाल्ला (दादला),       पत्नीला कारभारीण,

सासर्‍याला मामंजी,          सासूला आत्याबाई, 

नणंदेला वन्स,        बहिणीच्या पतीला दाजी म्हणतात,

——- हे आता नव्या पिढीला सांगावं लागतं, नाही का?

                   

स्वयंपाकघराचं किचन झालं–आणि कोरडयास (कोरडया पदार्थासह खायची पातळ भाजी) 

कालवण (ज्यात कालवून खायचे असा पातळ पदार्थ), आणि –

माडगं,    डिचकी,    शिंकाळं,    उतरंड,    भांची,    डेरा,    दुरडी,    बुत्ती, 

चुलीचा जाळ,    भाकरीचा पापुद्रा,    ताटली,    उखळ,    मुसळ 

——–हे शब्द नागर संस्कृतीनं बाजूला सारले.

 

रविवार हा सुट्टीचा दिवस—- निवांत असण्याचा दिवस म्हणून तो ‘आईतवार ‘ म्हटला जायचा

तर गुरुवार म्हणजे बृहस्पतीवार.

——-त्याचा अपभ्रंश होऊन बस्तरवार झाला.

 

पहाटेच्या वेळेला ‘झुंझुरकं’,    सकाळी लवकर म्हणजे ‘येरवाळी’ किंवा ‘रामपारी’    आणि सायंकाळला सांजवेळ , दिवेलागण,      ‘कडुसं (कवडसे) पडताना’ अशी शब्दयोजना होती.

 

अंगदट (बळकट),     दीडकं-औटकं (एकपासून शंभर पर्यंतच्या  संख्येची पावकी, निमकी,पाऊणकी दीडपट-पावणेदोन पट साडेतीनपट संख्या दाखवणारं कोष्टक), 

झोंटधरणी (भांडण),     पेव,     कोठी,     कणगी (धान्य साठवण्याचं साधन) 

———हे शब्दही आताशा हरवलेत.

                   

इस्कोट (बिघडवणं),       सटवाई (नशिब लिहिणारी देवता),      सांगावा (निरोप), 

गलका (गोंगाट),       हेकना (चकणा),     मढं (मृतदेह),      पल्ला (अंतर), 

शिमगा (होळी किंवा शंखनाद),      चिपाड (वाळलेला ऊस),    अक्काबाईचा फेरा (दारिद्रय़),

अक्करमाशा (अनौरस),       अवदसा (दुर्दशा),      इडा-पीडा (सर्व दु:ख),     कागाळी (तक्रार), 

चवड (रास, ढीग),     झिंज्या (केस),    वंगाळ (वाईट),    डोंबलं (डोकं),      हुमाण (कोडं), 

भडभुंज्या (चिरमुरे, लाह्या भाजणारा)

 

——–ही सगळी मराठी भाषेला ग्रामीण भागानं दिलेल्या शब्द- भेटीतली वानगीदाखल उदाहरणे . 

 

आपण देखील आपल्या शब्दसंग्रहात असलेले, आपल्या मनातील पिंपळ पानावर कोरुन ठेवलेले, मात्र सध्या कालबाह्य झालेले शब्द व संकल्पनाच्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न करु या.

संग्राहक : माधव  केळकर 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ दिगंबरा दिगंबरा, श्रीपादवल्लभ दिगंबरा ☆ संग्राहक – श्री सुनीत मुळे

? वाचताना वेचलेले ?

☆ दिगंबरा दिगंबरा, श्रीपादवल्लभ दिगंबरा ☆ संग्राहक – श्री सुनीत मुळे ☆ 

श्री दत्तजयंतीच्या निमित्ताने “दिगंबरा दिगंबरा, श्रीपादवल्लभ दिगंबरा” या ध्यानमंत्राविषयी मिळालेली थोडी  माहिती —-

 दिगंबरा हा मंत्र प.पू.वासुदेवानंद सरस्वती यांना ब्रह्मानंद येथे शके १८२५ साली स्फुरलेला  १८अक्षरी मंत्र आहे. या मंत्राच्या रूपाने त्यांना अंतिम सत्याचा साक्षात्कार झाला. या मंत्रामध्ये एकाक्षरी गणेशमंत्र ,गणेशबीज समाविष्ट आहे. काही प्रमाणात अग्नीबीजाचाही वापर केला आहे. या महामंत्राचे स्पष्टीकरण एका आरतीमध्ये प.पू.वासुदेवानंद सरस्वतींनी केले आहे.

 त्याचा अर्थ पू. श्रीदत्तमहाराज कवीश्वरांनी पुढीलप्रमाणे सांगितला आहे –

या मंत्रात “अहं ब्रह्मास्मि” मी ब्रह्म आहे, आणि ते तूच आहेस हे सांगितले आहे. यातील पहिल्या दिगंबराचा अर्थ आहे वस्त्र नसलेला– म्हणजेच उपाधि नसलेला. हे लक्षात आले म्हणजे आपल्या आतील शुद्ध अहं अर्थात आत्मा सर्वसाक्षी, निर्विकार, अनंत अनादि असून ब्रह्मच आहे. पहिल्या दिगंबरा या शब्दाने साक्षी स्वरूपाचे अनुसंधान आहे. 

पुढच्या दिगंबराचा अर्थ आहे दिशांनी वेढलेला म्हणजे आकाशासारखा सर्वव्यापी— –त्रिकालाबाधित.विश्व निर्माण करण्याची शक्ती ब्रह्माजवळ आहे   पण शक्ती त्याच्या स्मरणात नाही. ‘हे ईश्वरस्वरूप आहे तेव्हा सर्वव्यापी अशाप्रकारचे जे ब्रह्मस्वरूप आहे ते मी आहे.’ हे चिंतन दुसऱ्या दिगंबरात आहे. परमात्म्याचे सगुण साकार रूप म्हणजे श्रीपादवल्लभ, ब्रह्मरूप धारण करून आपल्या भक्तांचे रक्षण करते.

श्रीपादवल्लभ हा या मंत्रातला  तिसरा शब्द. त्यात श्रीपाद आणि वल्लभ असे दोन शब्द आहेत. “श्रीः पादेयस्य”–ज्याच्या चरणाजवळ श्री आहे. लक्ष्मीयुक्त परमात्मा आणि शक्तीयुक्त परमात्म्याचे स्मरण श्रीपाद या शब्दाने होते. सर्वांना संकटातून मुक्त करून कल्याण करणारा असल्याने तो वल्लभ आहे. श्रीपादवल्लभ या संबोधनात हेच सुचविले आहे. 

ईश्वर स्वरूप, ब्रह्म स्वरूप, दत्त स्वरूप आणि गुरूस्वरूप ही सर्व एकच आहेत. त्याचे अनुसंधान दिगंबरा या चौथ्या अक्षराने येथे केले आहे.’ कामक्रोधांनी त्रस्त झालेल्या मला मुक्त करून आपल्याकडे न्या ‘ अशी आर्त प्रार्थना या दिगंबरात दडलेली आहे.

अशा या महामंत्राचा जप करणे ही श्रेष्ठ उपासना आहे. या मंत्रामुळे साधकाची देहशुध्दी आणि चित्तशुध्दी होते. शरीर तेजस्वी होते. साधक दिव्यानुभव ग्रहण करण्यास समर्थ होतो. म्हणून दत्त संप्रदायाचा हा मुख्य मंत्र आहे. 

संग्राहक :- श्री सुनीत मुळे 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ मधुलिका…सावली एका वीर योद्ध्याची !- भाग-2…. संभाजी गायके ☆ संग्राहिका – सौ.स्मिता पंडित

? वाचताना वेचलेले ??‍?

☆मधुलिका…सावली एका वीर योद्ध्याची ! – भाग-2 ….संभाजी गायके ☆ संग्राहिका – सौ.स्मिता पंडित  ☆ 

( तिथून जी पराक्रमाची घोडदौड सुरू झाली ती अगदी काल-परवापर्यंत म्हणजे अगदी भारताचे पहिले C.D.S. अर्थात चीफ ऑफ़ डिफेन्स स्टाफ पदी निवड होईतोवर.) इथून पुढे —–

त्यांच्या उण्यापु-या ३७ वर्षांच्या सैन्य-जीवनातील ३० वर्षांची मी साक्षीदार ! संसारवेलीवर दोन फुलांसारख्या मुली दिल्या देवाने ! अक्षरश: शेकडो धोकादायक, गुप्त सैनिकी-कारवायांमध्ये साहेब अगदी फ्रंटवर असत. पण त्याची झळ त्यांनी आमच्या संसाराला लागू दिली नाही. कश्मिरात आणि अन्य ठिकाणी पहाडांवर केलेल्या, जीवावर बेतू शकणा-या काऊंटर इन्सर्जन्सी कारवाया,  चीन सीमेवरचा विशिष्ट संघर्ष असो, सर्जिकल स्ट्राईक, म्यानमार कारवाई असो, साहेबांनी या कानाची खबर त्या कानाला लागू दिली नाही. सगळं यथासांग झाल्यावर वर्तमानपत्र, बातम्यांतून साहेबांचा पराक्रम कळायचा. पण काळजात काळजीचे ढगही दाटून यायचे. पण ते सीमेवर गुंतलेले असताना ‘नो न्यूज इज गुड न्यूज’ म्हणत दिवस ढकलायचे याची सवय झाली होती. कधी भारतीय सैनिक, अधिकारी युद्धात कामी आल्याच्या बातम्या आल्या की हृदय पिळवटून निघायचे ! त्यांच्या तरूण विधवांची समजूत काढता-काढता जीव कासावीस व्हायचा. ‘ आपल्याही कपाळीचं कुंकु असं अकाली विस्कटलं तर?’ हा विचार आत्म्यास चिरत जायचा ! साहेब जस-जसे मोठ्या पदांवर चढत गेले तस-तसे त्यांच्यासोबत राहण्याची संधी मिळत गेली. मुलींचे शिक्षण, त्यांचे  विवाह इ. आघाडी सांभाळण्यात मी तरबेज झालेच होते. पण आता आणखी मोठा संसार करण्याची, नव्हे सावरण्याची जबाबदारी नशिबाने मिळाली. देशासाठी प्राणांची आहुती दिलेल्या जवानांच्या विधवा पत्नींना नुकसानभरपाईसोबत आणखीही काही हवं असतं. नव्हे, समाज त्यांचं देणं  लागतो…मानसिक आधार, समुपदेशन आणि संसार सांभाळण्यासाठी आर्थिक पाठबळ देऊ शकेल असे व्यावसायिक कौशल्य-प्रशिक्षण ! त्यांच्या इतर  समस्या तर वेगळ्याच. पण या कामात माझी मानसशास्त्रातील पदवी, मी आधी कॅन्सरपीडितांसाठी केलेल्या कामाचा अनुभव या बाबी मदतीला आल्या. जीव ओतून काम तर करतच होते..एवढ्या मोठ्या सैन्य-अधिका-याची पत्नी…शोभली तर  पाहिजेच ना ? साहेबांनी देशात-परदेशात अनेक मानसन्मान मिळवले. त्यांना चार स्टार मिळाले होते..आणि ते स्वत: एक स्टार…मिळून फाईव स्टार ! युनिफॉर्मवरील पदकांची चमक तर कुबेराचे डोळे  दिपवणारी ! प्रदीर्घ सैन्यसेवा आणि प्रदीर्घ संसार…दोन्ही आघाड्यांवर बिपिनजी विजेता. दोन्ही मुली म्हणजे जीव की प्राण ! आणि मी? कर्तव्याच्या म्यानातली मी दुसरी तलवार असले तरी मला त्यांनी पहिल्या तलवारीच्या जखमा कधीच सोसायला लावल्या नाहीत. पहाडी युद्धातले तज्ज्ञ असलेले बिपिनजी माझ्यामागे पहाडासारखे उभे असत. मृत्यूशी मैत्रीपूर्ण संबंध असलेले बिपिनसाहेब २०१५ मध्ये एका भयावह हेलिकॉप्टर अपघातात मृत्यूशी मिलिट्री-हॅंडशेक करून आलेले होते. परंतू पुढे कधीही हेलिकॉप्टरमध्ये बसायला कचरले नाहीत. ते मोहिमेवर निघाले की त्यांच्यासोबत जायचा हट्ट करावसा वाटे…पण ते शक्य व्हायचेच नाही. सेवानिवृत्ती झाली न झाली तोच भारतमातेच्या सेवेची महान जबाबदारी शिरावर येऊ घातली…

ऑल्वेज अ सोल्जर या न्यायाने बिपिनजींनी ती स्विकारलीही. आता मात्र मला माझ्या साहेबांसोबत जाण्याचा अधिकार आणि संधीही मिळू लागली…आणि मी ती आनंदाने साधतही होते….शिवाय मी AWWA (Army Wives Welfare Association)ची प्रमुखही झाले होते…साहेबांना आणि मलाही देशासाठी, सैनिकांसाठी, त्यांच्या विधवांसाठी, मुला-बाळांसाठी आणखी खूप काही करायचे होते…वैधव्य आणि एकाकीपणा कपाळी आलेल्या सैनिकपत्नींचे दु:ख मी जवळून अनुभवले होते. ती भिती मी अनुभवली होती…एकदा तसा प्रसंग माझ्यावर येता-येता राहिला होता. म्हणून मी सतत साहेबांसोबत राहण्याचा हट्ट धरत असे आणि तशी अधिकृत संधीही मला  मिळत असे..

८ डिसेंबरलाही मी साहेबांसोबत होते…आणि आता त्यांच्यासोबतच अनंताच्या प्रवासाला निघाले आहे..त्यांच्या हातात हात घालून !

(सैनिक देशासाठी लढत असतात, बलिदान देत असतात. त्यांच्या कुटुंबियांचाही त्याग मोठा. भारतमातेचे वीर सुपुत्र बिपिनजी रावतसाहेब आणि त्यांच्या सहका-यांना भावपूर्ण नमन करताना रावतसाहेबांच्या धर्मपत्नी मधुलिका बाईसाहेबांनाही सॅल्यूट आणि भावपूर्ण श्रद्धांजली !

—-जय हिंद ! जय हिंद की सेना ! )

समाप्त

(उपलब्ध माहितीवरून,संदर्भावरून आणि जरूर त्या ठिकाणी काल्पनिकतेचा आधार घेऊन श्रद्धापूर्वक केलेले स्वलेखन:)

लेखक : – संभाजी गायके. ९८८१२९८२६०)

संग्राहिका – सौ. स्मिता पंडित

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ मधुलिका…सावली एका वीर योद्ध्याची !- भाग-1 …. संभाजी गायके ☆ संग्राहिका – सौ.स्मिता पंडित

? वाचताना वेचलेले ??‍?

☆मधुलिका…सावली एका वीर योद्ध्याची ! – भाग-1 ….संभाजी गायके ☆ संग्राहिका – सौ.स्मिता पंडित  ☆ 

”आपल्या प्रिन्सेस मधुलिकासाठी आता एखादा राजकुमार पहायला हवा! ”  मी जेव्हा जेव्हा कॉलेजातून एखादं प्रमाणपत्र, एखादं पारितोषिक घेऊन घरी यायचे तेव्हा तेव्हा पिताश्री आमच्या मातोश्रींना हे वाक्य म्हणायचेच !

आज मी मानसशास्त्रातील डिग्री घेऊन घरी आले तेव्हाही अगदी तोच संवाद झडला आई-बाबांच्यात. पण यावेळी बाबांच्या आवाजात काहीसा निश्चयच दिसला. मी म्हटलं,”आता कुठे राहिलेत राजेरजवाडे,मला राजकुमार मिळायला? तुम्ही तर आता राजकारणात आहात…एखाद्या मोठ्या नेत्याच्या मुलाशी द्याल माझी लग्नगाठ बांधून ! ” बाबा म्हणाले,” आता स्वतंत्र हिंदुस्थानात कुणी राजा नसला तरी शूर सरदारांची काही कमतरता नाही. माझ्या पाहण्यात एक लढवय्या, हुशार, राजबिंडा तरूण आहे- तुझ्यासाठी सुयोग्य असा. मी पूर्वतयारी करून ठेवलीय, फक्त तुझ्या मनाचा अंदाज घ्यावा म्हणून थांबलो होतो ! ”  हे ऐकताना माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले होते. पण बाबा पुढे म्हणाले ते ऐकून एकदम धक्काच बसला. “ मधुलिका,पण एक अडचण आहे…त्याचं एक लग्न झालंय आधीच ! ”  माझ्या चेह-यावरचं भलंमोठ्ठं प्रश्नचिन्ह पाहून बाबा हसून म्हणाले, 

” अगं आर्मी ऑफिसर आहे तो…तलवारीशी लगीन झालंय त्याचं आधीच. ”  माझ्या चेह-यावरचं प्रश्नचिन्ह आता अधिकच बाकदार झालं होतं. “ बाबा ! नीट सांगा ना अहो ! ”  त्यावर बाबा म्हणाले,

” बिपिन रावत त्याचं नाव. एका मोठ्या आर्मी ऑफिसरचा सुपुत्र. एन.डी.ए. पासआऊट आहे. आणि इंडियन मिलिटरी अ‍ॅकॅडमी, डेहराडून मधल्या ट्रेनिंगमध्ये पहिला नंबर पटकावून बहादराने मानाची तलवार मिळवलीय…स्वोर्ड ऑफ ऑनर ! हमने तुम्हारे लिए बात चलायी है….! “  यानंतर बाबा माझ्याशी,आईशी काय काय बोलत राहिले कोण जाणे ! माझं कशातही लक्ष नव्हतं ….मी तर अगदी हरखूनच गेले होते… मला असंच आव्हानात्मक, साहसी आयुष्य हवं होतं ! आणि सैनिकाशिवाय ते मला दुसरं कोण देऊ शकणार होतं ? आणि त्यात बिपिन तर आर्मी ऑफिसर ! लहानपणापासूनच मला त्या रूबाबदार युनिफॉर्मचं भारी आकर्षण होतं. कर्मधर्मसंयोगानं मनासारखं आयुष्य लाभणार होतं….माझा होकार माझ्या लाजण्यातूनच व्यक्त झाला. मग लग्नाआधी मीही थोडा अभ्यास केला आर्मी लाईफचा. (हो, आर्मीवाल्यांच्या सगळ्या रॅंक्स मी लग्नाआधीच माहित करून घेतल्या होत्या…बाबा म्हणालेच होते…बिपिन एक दिन बहुत बडे अफसर बनेंगे !) बिपिनजींचे वडील म्हणजे माझे सासरे लक्ष्मणसिंग रावत त्यावेळी लेफ्टनंट जनरल पदावर होते आणि भटिंडा येथे पोस्टेड होते. त्यामुळे माझी आणि बिपिनसाहेबांची एंगेजमेंट भटिंडा मिलिटरी कॅम्प मध्येच झाली. बिपिन साहेब त्यावेळी कॅप्टन होते आणि सैन्य कारवायांच्या धकाधकीतून लग्नासाठी कशीबशी सुट्टी काढून आले होते ! आमचे शुभमंगल मात्र दिल्लीत झाले..वर्ष होते १९८५! साहेबांचं पहिलं प्रेम म्हणजे आर्मी ! सुरूवातीला सवत वाटणारी आर्मी नंतर माझी लाडकी झाली. वन्स अ‍ॅन आर्मीमॅन…ऑल्वेज अ‍ॅन आर्मीमॅन च्या चालीवर मीही आर्मीवुमन झाले. लग्नानंतर अगदी थोड्याच दिवसांत साहेब बॉर्डरवर रूजू झाले. संसाराच्या उंब-यापेक्षा त्यांचं मन लाईन ऑफ अ‍ॅक्च्युल कंट्रोलवरच्या उंब-यावर जास्त धाव घेई. मी सोबत जाण्याचा आग्रह केला की फक्त गोड हसायचे ! म्हणायचे ‘ एक म्यान में दो-दो तलवारे कैसे सँभालू ? ‘ त्यांचे सहकारी त्यांना ‘मॉस’ म्हणजे Married Officer Staying Single’ म्हणत असत. मॉस म्हणजे इंग्लिशमध्ये शेवाळं. A rolling stone does not gather moss असं म्हटलं जातं. म्हणजे सतत गडगडणा-या दगडावर शेवाळं साचत नाही. अर्थात सतत भटकत असलेल्या माणसावर फारशी जबाबदारी नसते. पण साहेबांचं मात्र तसं अजिबात नव्हतं. सतत शिकत  राहणं, सतत धाडसी मोहिमा आखणं आणि त्यांचं नेतृत्व करणं हे त्यांच्या जणू स्वभावातच होतं. वडिलांच्याच बटालियन मध्ये पहिलं पोस्टिंग झालेलं ! तिथून जी पराक्रमाची घोडदौड सुरू झाली ती अगदी काल-परवापर्यंत, म्हणजे अगदी भारताचे पहिले C.D.S. अर्थात ‘ चीफ ऑफ़ डिफेन्स स्टाफ’ पदी निवड होईतोवर.

क्रमशः….

(उपलब्ध माहितीवरून,संदर्भावरून आणि जरूर त्या ठिकाणी काल्पनिकतेचा आधार घेऊन श्रद्धापूर्वक केलेले स्वलेखन:)

लेखक : – संभाजी गायके.

९८८१२९८२६०

संग्राहिका – सौ. स्मिता पंडित

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ रामा मला दागिने दे… ☆ प्रस्तुती – सौ.अस्मिता इनामदार

सौ.अस्मिता इनामदार

? वाचताना वेचलेले ?

⭐ मा मला दागिने दे—-  ⭐  प्रस्तुती  सौ.अस्मिता इनामदार ⭐

चला विरक्ती आली,

दागिन्यांची आसक्ती संपली…

या बाह्य सौन्दर्यापासून आता,

मुक्ती हवीशी वाटू लागली !

 

पण सुंदर दिसण्याचा 

स्त्रीसुलभ विचार,

डोक्यातून काही जाईना…

आणि दागिन्याची हौस मनाला,

स्वस्थ काही बसू देईना !

 

मग मी रामाकडे घेतली धाव,

म्हणाले, तूच यातून मला सोडव…

तू माझा सोनार हो….आणि

माझे दैवी दागिने घडव !

 

चेहर्‍यासाठी माझ्या घडव

सुहास्याचा दागिना…

मुखावर माझ्या कधी न उमटो

मनातली विवंचना !

 

कानासाठी माझ्या घडव,

तू असे सुंदर झुबे…

माघारीही माझ्याबद्दल,

चांगलंच ऐकू येऊ दे !

 

गळ्याभोवती माझ्या असूदेत,

सतत आप्तजनांचे हात…

काय करायचेत आता मला,

चंद्रहार आणि पोहेहार ?

 

पाटल्या बांगड्या यांनी आजवर,

शोभा वाढवली हाताची…

आता वेळ आलीय, 

हात दानाने मोकळे करण्याची !

 

वेळोवेळी सजली माझी

मेखला कंबरपट्टा यांनी कंबर…

आता तिची खरी शोभा,

ती ताठ आहे तोवर !

 

 जोडवी अशी जड घडव, 

की पाय जमिनीवरच राहतील…

आता सांग हे रामा 

हे सारे दागिने केव्हा देशील,

 

दैवी दागिन्याची माझी मागणी ,

रामचंद्र  सोनारानं नोंदवून घेतली…

“जरा वेळ लागेल” अस म्हणत,

स्वत:ची भूमिका स्पष्ट केली

 

हसतच वदला रामराया……. 

 

“अहो ,हे दागिने तयार नसतात,

कारण त्यांना तेवढी मागणी नसते..

पण हे अनमोल दागिने घडवेपर्यंत,

घेणाऱ्या भक्ताची, (पैशाची नव्हे) मनाची श्रीमंती वाढावी,

एवढीच माफक अपेक्षा असते !

 

घडणावळीची काळजी नको,

कारण आम्ही ती घेतच नाही.. 

रामनाम चालू ठेव  

दागिने लवकरच घरपोच होतील

 

असे दुर्मिळ दागिने घडवत राहणं…खरेतर हाच माझा छंद..

 

त्यासाठीच मी छातीवर हात ठेवून उभा आहे…

तुझ्या सारख्या अनोख्या भक्तांची वाट पहात…

कारण भक्तांच्या इच्छा पुरविणे, भक्तांचे  भय नाहीसे करणे..

 

हेच तर माझे कर्तव्य….?

 

प्रस्तुती : सौ अस्मिता इनामदार

पत्ता – युनिटी हाईटस, फ्लॅट नं १०२, हळदभवन जवळ,  वखारभाग, सांगली – ४१६ ४१६

मोबा. – 9764773842

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ अप्रूप पाखरे – 25 – रवींद्रनाथ टैगोर ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ अप्रूप पाखरे – 25– रवींद्रनाथ टैगोर ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ 

[११७]

या माझ्या लहानशा जगात

राहतो मी दिवसरात्र जपत

क्षुद्र …क्षुल्लक … क्षीण गोष्टी

उचलून घे ना मला

तुझ्याच जगात

आणि दे स्वातंत्र्य

अगदी आनंदाने

स्वत:लाच हरवून टाकण्याचे

पुसून टाकण्याचे … 

 

[११८]

परिवर्तनाचं वैभव असतो

काळ म्हणजे

पण घड्याळ जेव्हा

विडंबन करतं काळाचं

तेव्हा शिल्लक रहातं

केवळ परिवर्तन

एका क्षणाचं दुसर्‍या क्षणात

वैभवाचा मागमूसही

नसतो त्यात….

 

[११९]

दिवा विझल्यावर

अधिकच मादक बनून

मला बिलगणार्‍या

माझ्या प्रियेसारखी

चारी बाजूंनी

जाणवत रहाते मला

ही काळोखी रात्र

विलक्षण सौंदर्याचा

रेशमी पोत असलेली

 

[१२०]

धुकं पूर्णपणे वितळल्याशिवाय

स्वच्छ प्रकाशात नाही

सकाळचा सूर्य

तशी

माझं नाव पुसून टाकल्याशिवाय

ओसंडत नाही

तुझ्या नामाची माधुरी  

 

मूळ रचना – स्व. रविंद्रनाथ टैगोर 

मराठी अनुवाद – रेणू देशपांडे (माधुरी द्रवीड)

प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares
image_print