मराठी साहित्य – विविधा ☆ महिला दिन आत्ताच का? ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी ☆

प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी

🌸 विविधा 🌸

☆ महिला दिन आत्ताच का? ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी 

अनादी अनंत चार युगे उलटली महिला आहे, म्हणूनच जग आहे. हे खरं आहे, जगाला आजच का सजगता आली, स्त्री केव्हापासून पूजनीय वाटू लागली? पूर्वी ती पूजनीय नव्हती का? चाली रूढी परंपरा ही तर भारतीय संस्कृती. विसरलात का! मग आजच नारीचा, नारीशक्तीचा डांगोरा पिटण्यात कुठला पुरुषार्थ (स्रीअर्थ) आला बुवा?

पाश्चात्य संस्कृतीचे अंध अनुकरण का? पूर्वी इतकी स्त्री पूज्यनीय आता आहे असं वाटत नाही का? बिलकुल नाही. पूर्वी जेवढी स्त्री पुजनीय होती, तेवढी आता नाही! होय मी ह्या विधानाचा समर्थन करतोय.

यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः—– ह्या विधानात सर्व काही आले व ते खरे केले. पुरुष प्रधान संस्कृतीच आत्ता ज्यास्त फोफावली आहे हे लक्षात ठेवा. बस म्हटले की बसणारी, उठ म्हटले की उठणारी स्त्री म्हणजे हातातील खेळणं आहे असं वाटत काय?

हल्ली काळानुसार सोई सुविधांचा वापर करणे इष्टच, कारण ती गरज आहे. गरज शोधाची जननी! काळ बदलला, नारी घरा बाहेर पडली. कारण परिस्थितीच तशी चालून आली. एकाच्या कमाई वर भागात नाही म्हणून, प्रत्येक क्षेत्रात ती उतरली. व ते साध्य साधन करून दाखवत, ती सामोर गेली व उभी राहिली. ती साक्षर झाली, मिळवती झाली, अर्थ कारण हा पुरुषार्थ तिने सहज साध्य केला. अस जरी असलं तरी तिच्या मागचा चुल, मुलं, बाळंतपण, पाळणा ह्या गोष्टी परत आल्याच व त्या पण साध्य केल्या, हे त्रिवार सत्य!

पूर्वीच्या काळातही परिस्थिती ला अनुसरून महिलांनी घर खर्चाला आधार कैक पटीने ज्यास्त दिला! आठवा त्या गोष्टी गिरणी नव्हती हाताने दळण कांडणच काय? घरातील जनावरांचा पालन पोषण, गाय म्हैस बकरी इत्यादीचे धारा, चारा पाणी, इत्यादी करून दुध दुभते त्या विकून घरार्थ चालवीत. अजूनी खेड्यात ही प्रथा चालु आहेच. जोडीला शेती काण्यात पण स्त्रिया मागे नव्हत्याच!

मथुरा असो की द्वारका तिथं पण हे वरील सर्व व्यवहार सुरळीत चालु होतेच की. नुसतं गौळण श्रीकृष्ण राधा, रासक्रीडा काव्यात जे मांडतो ते, तिथं अस्तित्वात होतच ना? कपोलकल्पित गोष्टी नाहीतच ह्या. स्त्रीया पुरुषां बरोबरीने अंग मेहनत करत. त्या अर्थार्जन करत होत्या! ! !

लग्न झालेली नवं वधु तिचे आगमन, तिच्या हाताचे पायाचे कुंकवाचे ठसे, जोडीने केलेली पुजा असो वा कुलदैवत दर्शन असो तिचे मंगळागौर असो किंवा डोहाळ जेवण इत्यादि गोष्टी ह्या, स्त्री जन्माला आलेला मान पानच, किंवा गौरव च होतो ना! प्रत्येक गोष्टीत तिचा पुढाकार हा महिला दिनच होता ना!

सावित्री, रमा, जिजाऊ, कित्तूर राणी चन्नांमा, झाशीची राणी ह्या सर्व लढाऊ बाण्याची प्रतीकच होती ना?

काळ बदलला, आस्थापना, कार्यशैली बदलली. युग नवं प्रवर्तन घेऊन नवं कार्याचा भाग पण बदलला.

तरी स्त्री आजुनी खम्बीर आहे. कामाचा व्याप क्षेत्र बदलले. पूर्वीपेक्षा अत्याचार, बलात्कार, गर्भपात मात्र दिवसा गणिक वाढते आहे! पूर्वी पेक्षा नारी सुरक्षित नाहीं कारण स्पष्टच. चित्रपट टेलीव्हिजनवर येणाऱ्या मालिका, चंगळवाद यांनी मनोवृत्ती बिघडली आहे.

महिला दिनाच्या निमित्ताने नारी संघटित होऊ पाहत आहे. पूर्वीही संघटीत होत्या. नाही असे नाही. तरीपण आज मात्र ही काळाची गरज आहे!

© प्रो डॉ प्रवीण उर्फ जी आर जोशी

ज्येष्ठ कवी लेखक

मुपो नसलापुर ता रायबाग, अंकली, जिल्हा बेळगाव कर्नाटक, भ्रमण ध्वनी – 9164557779 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ स्त्रीची आत्मनिर्भरता जोपासणारे समर्थ रामदास!! ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? विविधा ?

☆ स्त्रीची आत्मनिर्भरता जोपासणारे समर्थ रामदास!! ☆  सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

स्त्रियांनी शिकावे, स्वत:च्या पायावर उभे रहावे या ध्येयाने प्रेरित होऊन त्यासाठी आयुष्य वेचणारे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले, तसेच विशेषत: निराधार महिलांसाठी याच दृष्टीने सतत प्रयत्नशील असणारे महर्षी कर्वे हे समस्त स्त्री जातीसाठी कायमच अतिशय वंदनीय आहेत यात दुमत असण्याची शक्यताच नाही.

स्त्रीने शिकायला हवे, आत्मनिर्भर व्हायला हवे, या विचाराचे बीज मुळात कुठे रोवले गेले असावे, असा विचार करतांना मात्र मन नकळत १७ व्या शतकात पोहोचले… सज्जनगडावर घिरट्या घालू लागले, शिवथर घळीत रेंगाळले, ते या संदर्भात श्री समर्थ रामदास स्वामींची प्रकर्षाने आठवण झाली म्हणून. याबाबतीत समर्थांनी इतक्या वर्षांपूर्वी उचललेली पावले, आणि एकूणच त्यांच्या प्रागतिक विचारांचा आजच्या महिला दिनाच्या निमित्त जरासा आढावा घेण्याचा हा प्रयत्न…..

समाजाला बरोबर घेऊन जाणारा संप्रदाय अशी समर्थ संप्रदायाची सार्थ ओळख सांगता येईल. त्या काळच्या परिस्थितीत अनेक नको त्या अहितकारी आणि अवाजवी विचारांमुळे आणि अस्मानी तसेच सुलतानी संकटांमुळे अती दीन झालेल्या आणि रूढी-परंपरांना अनेक प्रकारे जखडल्या गेलेल्या समाजाचा कायापालट करण्याचा निर्धार समर्थांनी केला होता हे त्यांच्या चरित्रावरून आणि दासबोध, मनाचे श्लोक यासारख्या त्यांच्या ग्रंथनिर्मितीवरून स्पष्टपणे लक्षात येते. संपूर्ण समाज संघटित करायचा, समाजाचा कायापालट करायचा तर स्त्री-पुरुष समानता आवश्यक आहे, या विचाराची ठाम जाणीव समर्थांना होती, असेच खात्रीने म्हणायला हवे. त्यावेळच्या सामाजिक विचारधारेच्या पूर्णपणे विरोधात जाऊन, समाजाने स्त्रीच्या आत्मसन्मानाची जाणीव ठेवायला हवी हे त्यांनी स्वत:च्या आचरणातून दाखवून दिले होते. ‘परमार्थ’ हा प्रांत फक्त पुरुषांसाठी राखीव नसून, स्त्रियांनाही तो हक्क आहे असे फक्त आवर्जून सांगून ते थांबले नाहीत, तर त्यांनी स्त्रियांनाही आपल्या संप्रदायाचे शिक्षण दिले…आपले लोकहिताचे… लोककल्याणाचे विचार त्यांनाही शिकवले. (‘लोकहित’.. ‘लोककल्याण’ म्हणजे काय या विचारात किंवा व्याखेत त्या काळाच्या तुलनेत आता आमूलाग्र बदल झालेला आहे हे तर यासंदर्भात गृहीतच धरायला हवे. ) समाजाला त्यावेळी आवश्यक असणारी योग्य दिशा दाखवण्याच्या आपल्या सततच्या कार्यात स्त्रियांनाही, अगदी अल्प प्रमाणात का होईना, पण सहभागी करून घेण्यासाठी त्यांनी अविचल प्रयत्न केले. त्या काळात त्यांनी एकूण ४० स्त्रियांना सती जाण्यापासून रोखले होते हे वास्तव अनेकांना बहुदा ज्ञात नसावे… हे अंधश्रद्धेविरुद्ध उचललेले पाऊल नक्कीच होते.

आपले उदात्त ध्येय साध्य करण्यासाठी भ्रमंती करत असतांना मिरज येथे त्यांना वेण्णाबाई भेटली… केवळ लग्न झाले होते म्हणून ती ‘बाई’… प्रत्यक्षात ती जेमतेम ११-१२ वर्षांची बालविधवा होती. आणि त्यावेळी ‘मान्यता प्राप्त’ असलेले विधवेचे जीवन जगत होती… घरकाम, देवाचे नाव घेत रहाणे आणि चुकून अक्षर ओळख झालेली असली तर जमेल तसे धार्मिक ग्रंथ वाचणे… एवढंच काय ते ‘जीवन’.

एकदा समर्थ तिच्या घरी भिक्षा मागण्यासाठी गेलेले असतांना, वेण्णाबाई एकनाथी भागवत वाचत असल्याचं त्यांनी पाहिलं आणि ‘‘ मुली तुला यातले काही समजते का? ” असं विचारलं. आणखीही काही प्रश्न विचारले… समर्थांना तिचं…तिच्या बुध्दीचं वेगळेपण जाणवलं. आणि वेण्णाबाईलाही ‘हेच आपले गुरू’ असं मनापासून जाणवलं…आणि त्यांनी समर्थांचं शिष्यत्व पत्करलं… त्याही काळात त्यांचं वाचन प्रचंड होतं, नकळत अध्यात्माची आवडही निर्माण झाली होती…पण हे सगळं उंबऱ्याच्या आत… चार भिंतीत. पण त्यांच्या वडलांना त्यांची तगमग समजत होती… ज्ञानाची ओढ समजत होती… त्यांनी तिला समर्थांबरोबर जाण्याची परवानगी दिली. आणि हेही त्या काळानुरुप अपवादात्मक आणि म्हणून कौतुकास्पदच होते.

‘‘उत्कट भव्य तेचि घ्यावे। मळमळीत अवघेंचि टाकावे।

निस्पृहपणे विख्यात व्हावे। भूमंडळी॥”

– – हा समर्थांनी त्यांना शिकवलेला पहिला धडा असावा. यातला ‘मळमळीत’ हा शब्द तेव्हाच्या स्त्री जीवनावर लख्ख प्रकाश टाकणारा आहे.

‘उत्कट निस्पृहता धरिली। त्याची कीर्ती दिगंती फाकली। उत्कट भक्तीने निवाली। जनमंडळी॥’

– या विचाराचे बीजही समर्थांनी त्यांच्या मनात पेरलं. त्यांची तैलबुद्धी आणि गोड गळा लक्षात घेऊन समर्थांनी त्यांना सातत्याने ग्रंथवाचन, पाठांतर तर करायला लावलंच, पण एक गायन गुरू नेमून गायनदेखील शिकवलं.. आणि एक दिवस त्यांना चक्क कीर्तनाला उभं केलं. विधवा स्त्रीने लोकांसमोर उभं राहून कीर्तन करणं ही स्त्रीच्या आत्मनिर्भरतेची अनासायाने सुरुवातच समर्थांनी करून दिली होती असं नक्कीच म्हणायला हवं… पण त्या काळात विधवा स्त्रीने असं जाहीर कीर्तन करणं ही खरोखरच एक ‘क्रांती’ होती. समाजाच्या उध्दारासाठी अशी क्रांतीकारक पावलं उचलणा-या सर्वांनाच आधी जननिंदेला, समाजाच्या रोषाला सामोरं जावं लागतं हे वास्तव आपल्याला ज्ञात आहेच, आणि समर्थ त्याला अपवाद नव्हते.

मानवी जीवनाचा अटळ नियम असा आहे की कालांतराने जीवन मूल्यांमध्ये, जीवनपद्धतीमध्ये परिवर्तन घडावेच लागते… घडवावे लागते. त्यामुळे समाजातील जिवंतपणा टिकून रहातो. त्यासाठी ‘क्षणाक्षणा परीक्षिले पाहिजे लोक’ असं समर्थांना ठामपणे वाटत असे. पण म्हणून त्यांनी स्त्रियांना हे क्षेत्र उपलब्ध करून देतांना उतावळेपणा केला नव्हता.

‘अभ्यासे प्रगट व्हावे। नाहीं तरी झाकोन असावे।’ असाच त्यांचा उपदेश होता. स्त्रीने आत्मनिर्भरता अंगी बाणवावी, पण ते करत असतांना मनातली मातेची ममता त्यागू नये हेही त्यांनी स्त्रियांना बजावल्यासारखे सांगितले होते हे आज आवर्जून लक्षात घ्यायला हवे. … ज्ञान मिळवतांना आणि स्वावलंबी होतांना स्त्रीने हेही लक्षात ठेवले पाहिजे की … वीट नाही कंटाळा नाही। आलस्य नाही त्रास नाही। इतुकी माया कोठेचि नाही। मातेवेगळी॥ असेही त्यांनी आवर्जून बजावले होते. पण आत्ताच्या काळातल्या आत्मनिर्भर होऊ इच्छिणा-या स्त्रिया नेमके हेच विसरतात की काय, अशी शंका येते, कारण अशीच परिस्थिती आता दिसते आहे.

समाज परिवर्तन करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने सुधारायला हवे यावर समर्थांचा भर होता, आणि हे साध्य करण्यासाठी स्त्री-पुरुष असा भेद अजिबातच असायला नको असंच त्यांचं प्रतिपादन होतं, म्हणून त्यांनी स्वत:ही असा भेद केला नाही. स्त्रियांनीही आत्मोन्नतीची संधी सोडू नये यासाठी ते आग्रही होते. अज्ञानाकडून ज्ञानाकडे जाण्याचा हक्क स्त्री-पुरुष सर्वांनाच आहे हा विचार त्यांनी आपल्या वागण्यातून ठळकपणे अधोरेखित केला होता. त्या काळानुसार समर्थांनी यासाठी भक्तिमार्ग सांगितला खरा, पण तो मार्ग विलक्षण बुध्दीप्रधान आणि विवेकाचा पुरस्कार करणाराच होता. परमार्थ हा सगळ्यांसाठी आहे…सगळ्यांना…म्हणजे स्त्रियांनाही तेथे अधिकार आहे हे सांगतांना… ‘‘भवाच्या भये काय भीतोसी लंडी। धरी रे मना धीर, धाकासीं सांडी॥” हा त्यांचा सल्ला स्त्री-पुरुष दोघांनाही दिलेला होता, हे आवर्जून लक्षात घेण्यासारखे आहे.

वेण्णाबाईंप्रमाणेच त्यांनी आक्काबाई, अंबिकाबाई या स्त्रियांनाही अभ्यासासाठी प्रवृत्त केले. कीर्तने करण्यास अनुमती दिली. वेण्णाबाईसारखी एक बालविधवा स्त्री धर्मग्रंथांचा अभ्यास करते, कीर्तने करते, जनतेचे प्रबोधन करते, याचा निषेध म्हणून कोल्हापुरात त्यांच्यावर अनेक आरोप होत होते. विषप्रयोगही झाला पण त्यांनी ते विष पचवून दाखवले… निंदकांना पश्चात्ताप झाला आणि त्यांनी त्यांची व समर्थांची क्षमा मागितली… त्यांनीही मोठ्या मनाने क्षमा केली…मग त्यांचा आणि त्यांच्याबरोबरच्या इतर स्त्रीशिष्यांचा अभ्यास आणि कीर्तन करणे चालूच राहिले. ‘ स्त्री कीर्तनकार इथूनच उदयाला आल्या ‘ असे म्हटले तर अजिबात वावगे ठरणार नाही.

याखेरीज वेण्णाबाईंमधील व्यवस्थापन-क्षमताही समर्थांनी जाणली होती. आणि अनेकदा रामनवमी उत्सवाची संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर सोपवली होती अर्थात् वेण्णाबाईंनी ती उत्तम प्रकारे पार पाडली होती. त्यांनी त्याकाळात ‘सीता-स्वयंवर’, मंचीकरण (वेदान्तावरील गद्य टिप्पण्ण्या), रामायणाची कांडे, आणि यासारखे ७-८ ग्रंथही लिहिले होते. काही अभंग, पदे असे स्फुट लेखनही केलेले होतं. आणि यासाठीही समर्थांनी त्यांना उत्तेजन दिलेलं होतं.

दुस-या शिष्या संत अक्काबाई यांनी समर्थ हयात असतांना ३५ वर्षे चाफळचा कारभार सांभाळला होता…त्यांच्या पश्चात ३८ वर्षे सज्जनगडाचा कारभार सांभाळला. १२व्या वर्षापासून त्या समर्थांबरोबर होत्या आणि त्यांच्यातले गुण ओळखून समर्थांनी त्यांना त्यानुसार शिक्षण देऊन तयार केले होते. (यासाठी ‘व्यवस्थापन’ हा वेगळा विषय तेव्हा नक्कीच नव्हता हे लक्षात घ्यायला हवे. ) विशेष म्हणजे औरंगजेबाने आक्रमण केल्यावर अक्काबाईंनी स्वत: हिम्मत करून गडावरचे पंचायतन वाघापूरला नेऊन रामनवमी साजरी केली होती.. आणि हे नियोजन आणि त्यामागचे त्यांचे धाडस याचे श्रेय समर्थांच्या द्रष्टेपणाला द्यायलाच हवे. आपल्या चाफळच्या मठात अशा अनेक विधवा, परित्यक्ता, अनाथ स्त्रियांना समर्थांनी बापाच्या मायेने आश्रय दिला होता. समर्थ इतक्या पुरोगामी विचारांचे होते की त्यांनी अशा प्रत्येक स्त्रीचे उपजत गुण, आवड, आणि कुवत लक्षात घेऊन प्रत्येकीला वेगवेगळी कामे शिकायला प्रवृत्त केले होते. कुटुंबाला नकोशा झालेल्या कित्येक स्त्रियांना आपल्या विविध मठांमध्ये त्यांनी फक्त मानाने आसराच दिला नाही, तर योग्यतेनुसार प्रत्येकीला आवश्यक तेवढे शिक्षण देऊन वेगवेगळ्या कामांची स्वतंत्र जबाबदारी पेलण्याइतके सक्षमही केले.

आत्ताच्या तुलनेत अशा स्त्रियांची संख्या अतिशय कमी होती हे जरी खरे असले, तरी “ स्त्री आत्मनिर्भर असायलाच हवी “ या समर्थांच्या ठाम विचाराचे इवलेसे बीज नक्कीच त्यामुळे रोवले गेले आणि आता त्या बीजाचा अवाढव्य वृक्ष झाला आहे हे सत्य नाकारता येणार नाही. या विचारामागची समर्थांची कळकळ, अतिशय दूरगामी विचाराने त्यादृष्टीने त्यांनी टाकलेली अत्यंत महत्वाची पावले, म्हणजे “ स्त्री शिक्षण.. तिचा आत्मसन्मान.. आणि तिचे आत्मनिर्भर असणे “.. या समाज-सुधारणेसाठी अत्यंत आवश्यक असणाऱ्या एक प्रकारच्या ‘ क्रांती ‘ साठी पायाच्या दगडासारखी होती हे सत्य त्रिवार मान्य करायलाच हवे …. काळ कितीही पुढे गेला तरीही.

श्री समर्थ रामदास हे खऱ्या अर्थाने काळाच्या पुढे असलेले द्रष्टे गुरू होते, स्त्री-उन्नतीचे खंदे समर्थक आणि आद्य पुरस्कर्ते होते, आणि त्यासाठी सर्व काही करण्यास तत्पर असणारे हाडाचे कार्यकर्ते होते … खऱ्या अर्थाने ‘ समाजसेवक ‘ होते, असं नक्कीच म्हणायला हवं … नव्हे मान्य करायला हवं. त्यांना मनःपूर्वक वंदन.

©️ सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “सुशिक्षित आहेत तरी कोठे?…” ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

☆ “सुशिक्षित आहेत तरी कोठे?…☆ श्री जगदीश काबरे ☆

शिक्षणाचा प्रचार-प्रसार वाढला तसे साक्षरतेचे प्रमाण वाढले आहे… वाढले नाही ते “सुशिक्षित”तेचे प्रमाण. उच्चपदवीधरही क्वचितच सुशिक्षित असतांना दिसून येतात. कारण ते त्यांच्या अविकसित जाणीवांच्या, बुरसटलेल्या विचासरणींच्या अधीन राहिल्यामुळे आणि आधुनिक विचारांपासून दूर पळण्याच्या प्रवृत्तीमुळे. त्यामुळे सामाजिक-सांस्कृतीक प्रश्न सुटणे तर दुरच, पण अधिकाधिक गुंतागुंतीचे होत चालल्याचे आढळुन येते. त्याचे पडसाद आपण जातपंचायतीच्या अनाचारातून अथवा नित्यश: वाढतच चाललेल्या जाती-धर्म-वर्चस्ववादातून आणि अंधश्रद्धायुक्त घटनांचे छद्मविज्ञानाच्या साह्याने समर्थन करतांना पाहू शकतो.

झापडबंद शिक्षणपद्धतीमुळे नागरिक “सुशिक्षित” होत नाही म्हणूनच तो आधुनिकही होऊ शकत नाही. अत्याधुनिक तंत्रज्ञाने मुबलकपणे वापरात आणली म्हणून कोणी आधुनिक होत नसतो. उलट असे कारणे म्हणजे माकडाच्या हाती कोलीत देणे होय. कारण आधुनिकता ही विचारांत व आचारांत आणावी लागते. सहिष्णुता-उदारता आणि प्रश्न मुळातून समजावून घेत नंतरच त्यावर भाष्य करण्याची प्रवृत्ती विकसीत करावी लागते. प्रत्यक्षात आपल्या सामाजिक जीवनात त्याचा दिवसेंदिवस अभाव वाढत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे अर्धवट ज्ञानाने अत्यंत घाईत नि:ष्कर्ष काढण्याच्या प्रवृत्तींना प्रोत्साहन मिळत आहे.

वाढत्या असहिष्णुतेचे दुसरे उदाहरण म्हणून आपण चिकित्सा नाकारण्याच्या वाढत्या दु:ष्प्रवृत्तीकडे पाहू शकतो. धर्मपंडितांना चिकित्सा अमान्य असते, हे गृहित धरले तरी ज्ञानाच्या विकसनासाठी ती सर्वसामान्यांना आवश्यक असते हे आपण लक्षात घेतले पाहिजे. इतिहासाची, ऐतिहासिक व्यक्तिमत्वांचीही पुन्हा पुन्हा चिकित्सा करणे हे समाजाच्या भावी विकसनासाठी आवश्यकच असते. किंबहुना अचिकित्सक समाज हा अंध समाज बनत जातो. म्हणूनच तो अंधारयुगात जगत असतो. आज अंधश्रद्धेच्या गर्तेत खोलवर बुडणारा, ढोंगी बाबांबुवांच्या पायाशी लीन होणारा आपला समाज एकूणातच अंधारयुगाकडे जोमाने वाटचाल करत आहे, असे खेदाने म्हणावे लागतेय. कारण आम्ही क्रमश: इतिहासाची परखड चिकित्सा आणि धर्मचिकित्सा थांबवत नेल्या आहेत. इतिहासाचे नको तसे उदात्तीकरण आणि ऐतिहासिक पुरुषांचे दैवतीकरण करत चाललो आहोत.

आज बुद्ध, राम, पैगंबर, शिवाजी महाराज ते बाबासाहेब यांची चिकित्सा करणे म्हणजे कोणता ना कोणता समाज सरळ शत्रू बनवून घेणे होय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. चिकित्सा, टिकात्मक टिप्पणी म्हणजे द्वेष पसरवणे असा सर्वसाधारण समज आपल्याकडे दृढ होत चालला आहे. प्रत्येक महापुरुष जातीत वाटला गेल्याने आपला इतिहास हा जातीनिहाय, धर्मनिहाय बनत गेला आहे. इतिहासाचे शुद्धीकरण करण्याच्या नादात जातीय मंडळी इतिहासाचे विकृतीकरण करत चालली आहेत. हे आपण असंख्य उदाहरणांतून पाहू शकतो. कुंभमेळा दरम्यान कोट्यावधी लोकांनी आंघोळ केल्यामुळे गंगेचे पाणी प्रदूषित झाले, त्यात मानवी विष्टेचे कण आढळले असा निष्कर्ष काढणाऱ्यांना आपण सहजपणे हा सनातन धर्माचा अपमान आहे म्हणून मोकळे होतो. एखाद्या व्यक्तीवरील टीका म्हणजे ती त्या व्यक्तीच्या जातीतील सर्वांवरीलच टीका असा सोयिस्कर अर्थ घेतल्यामुळे टीकाकारांवर झुंडीने हल्ले चढवणाऱ्या ट्रोलर महाभागांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. याचे कारण म्हणजे लोक पक्षीय, जातीय आणि धार्मिक बेड्यांत घट्ट अडकत आहेत. या बेड्या त्याला झुंडीच्या मानसशास्त्रानुसार वर्तन करायला लावतात.

चिकित्सेच्या अभावात ज्ञान आणि विचार पुढे जावू शकत नाहीत याचे भान आपण हरपून बसलो आहोत. आमचे पालक चिकित्सा नाकारतात. आमची शिक्षणपद्धतीही चिकित्सा नाकारते. धर्मशिक्षण, शालेय शिक्षण, उच्च-शिक्षण हे एकाच तागड्यात मोजता येईल असे बनवले जात आहे. धर्म नेहमीच चिकित्सा नाकारतो, कारण धर्माची बिंगे फुटण्याचा धोका असतो. धर्मचिकित्सकाला “पाखंडी” ठरवून मोकळे होणे त्यांना गरजेचे वाटते. माध्ययुगात युरोपातही असे घडून गेले आहे…पण तिकडील विचारकांनी धर्मलंडांचा प्रसंगी छळ सोसुनही शेवटी त्यांना शरण आणले. वैज्ञानिक सत्य स्वीकारण्यास भाग पाडले. कारण ते चिकित्सक होते… प्रश्न विचारत होते… उत्तरेही शोधत होते. म्हणून ते आधुनिकही बनले. आपण केव्हा बनणार? की अजूनही आपली मानसिकता प्राचीन आणि मध्ययुगात अडकलेली रहाणार?🤔

© श्री जगदीश काबरे

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग ४६ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग ४६ ☆ श्री अरविंद लिमये ☆

 (पूर्वसूत्र- “तुझ्या आईकडून समीर गेल्याचं मला समजलं त्या क्षणापासून खूप अस्वस्थ होते रे मी. तू हे सगळं कसं सहन करत असशील याच विचाराने व्याकूळ होते. घरी येताच सुचतील तसे चार शब्द लिहून पत्र पोस्टात टाकलं तेव्हा कुठे थोडी शांत झाले होते. खरं सांगू? मी काय लिहिलं होतं ते विसरूनही गेले होते. आज तू मनातलं सगळं बोललास तेव्हा ते मला नव्याने समजलं. समीरचा आजार पृथ्वीवरच्या औषधाने बरा होण्याच्या पलिकडे गेलेला आहे हे मला शप्पथ सांगते, खरंच माहित नव्हतं. ते सगळं

दत्तगुरुंनीच माझ्याकडून लिहून घेतलं हे आज माझ्या लक्षात आलंय. त्यांना दिलासा द्यायचा होता तुला आणि त्यासाठी मध्यस्थ म्हणून मी त्यांना योग्य वाटले हे लक्षात आलं आणि मी भरून पावले. हा दत्तगुरुंचाच सांगावा आहे असं समज आणि निश्चिंत रहा… !” लिलाताई म्हणाली. )

तिचा निरोप घेऊन मी बाहेर पडलो ते मनात भरुन राहिलेलं समाधान सोबत घेऊनच. समाधानाबरोबरच क्षणकाळापुरती कां होईना पण मनात निर्माण झालेली कांहीतरी राहून गेल्याची भावनासुद्धा होतीच. कारण लिलाताईने बोलून दाखवले होते ते तिच्याच मनातले विचार. पण नेमकं तसंच घडलं असेल? दत्त महाराजांनी खरंच ते त्या शब्दांत लिहायची प्रेरणा तिच्याही नकळत तिला दिली असेल? मनात अशी शंका घेणं मला योग्य वाटेना पण त्याचं समाधानकारक उत्तरही मला सापडेना. तिचा निरोप घेऊन मी बाहेर पडलो तेव्हा मनाला स्पर्शून गेलेल्या समाधानामुळे मन थोडं शांत होतं खरं पण या सगळ्या

अघटितामागचं गूढ मात्र उकललेलं नव्हतंच. माझ्या मनातल्या दत्तमूर्तीच्या चेहऱ्यावरील स्मितहास्यात लपून ते गूढ अधिकच गहिरं होत चाललेलं होतं.. !

मी घरी आलो. रुटीन हळूहळू सुरू झालं. आरती पूर्णपणे सावरली नसली तरी तिने आता मात्र लवकरात लवकर सावरायला हवं, तिने नव्याने सुरुवात करायला हवी असं मला मनापासून वाटतं होतं. तिच्या स्वास्थ्यासाठी ते गरजेचं होतं. ती तेव्हा आमच्या लग्नानंतर लगेचच मिळालेला युनियन बँकेतला जॉबच करीत असे. सुदैवाने कोल्हापूरमधे तेव्हा आमच्या बॅंकेच्या दोन ब्रॅंचेस असल्याने तिचं पोस्टिंग दुसऱ्या ब्रॅंचमधे सहजपणे होऊ शकले होते. तिची खरंतर शिक्षणक्षेत्रात काम करायची इच्छा होती. म्हणून तिला ही नोकरी अचानक मिळाली तेव्हा ती फारशी आवडलेली नव्हती. आता मात्र एकटेपणातून आणि पुत्रवियोगाच्या दुःखातून बाहेर पडण्यासाठी ही नोकरीच तिला मदतीची ठरणार होती. समीर गेल्यानंतर पुढे जवळजवळ एक महिना बिनपगारी रजा घेऊनही ती स्वस्थ नव्हतीच. म्हणूनच असं एकटेपणात रुतून बसणं हा आपल्या दुःखावरचा उतारा नाहीये हे तिलाही हळूहळू जाणवू लागलेलं होतं.

“चार दिवस का होईना जॉईन हो. तुझ्या प्रदीर्घ रजेमुळे स्टाफ शॉर्टेजचा त्रास ब्रॅंचमधील सगळ्यांनाच सहन करायला लागतोय. आपली गरज होती तेव्हा तेच सगळे मदतीसाठी धावून आलेले होते ना? मग निदान आता तरी त्यांचा त्रास वाढू नये याचा विचार आपण करायला हवा की नको? तुझं मन तिथं नाही रमलं तर एक महिन्याची नोटीस देऊन जॉब रिझाईन करायचं स्वातंत्र्य तुला आहेच. पण यापुढे असं अधांतरी नको राहूस. ” मी माझ्या परीने तिला वेळोवेळी हे सगळं समजावत रहायचो. अखेर तिने प्रयत्न करून पहायचं ठरवलं आणि एकटेपणाच्या खाईतून ती हळूहळू माणसात आली. वेगळं वातावरण, नवे विषय, नवी व्यवधानं यामुळे आपसूक ती नकळत सावरू लागली. तरीही मला बँकेतून घरी यायला तिच्यापेक्षा खूप उशीर व्हायचा. संध्याकाळी ती एकटी घरी आल्यानंतर बंद दाराआड समीरच्या व्याकूळ करणाऱ्या आठवणी तिच्या स्वागताला हजर असायच्याच.. ! त्या तशा रहाणारच होत्या. त्यांनी निघून जावं असं मलाही वाटत नव्हतं. पण त्या आठवणींमधे हिने रुतून बसू नये यासाठी माझे प्रयत्न असायचे.

या सगळ्या पार्श्वभूमीवर एक दिवस नवीन बाळाची चाहूल लागली! त्या जाणिवेच्या स्पर्शाने तिचे डोळे पाणावले. पण ते दुःखाचे नव्हे तर आनंदाचे अश्रू होते! समीर नक्की परत येणार आहे ही खूणगांठ माझ्या मनात पक्की होती पण आरतीला मात्र अजून मनापासून ते सगळं स्वीकारता येत नव्हतं.

यथावकाश या खेपेलाही तिच्या काळजीपोटी तिचे आई-बाबा बाळंतपणासाठी तिला आपल्या घरी सांगलीला घेऊन गेले. इकडे मी, माझी आई आणि माझा लहान भाऊ. तिकडचाच विचार आम्हा सर्वांच्या मनात सतत ठाण मांडून असायचा. समीरच्या स्वागतासाठी मी मनोमन अतिशय उत्सुक होतो पण ते उघडपणे व्यक्त करता येत नव्हतं तर दुसरीकडे आईच्या मनात सगळं सुखरूप पार पडेल ना याचीच काळजी असे!

बँकेत कामाच्या व्यापात काही काळ माझं मन गुंतून रहायचं खरं पण ते तेवढ्यापुरतंच. सांगलीहून येणाऱ्या निरोपाची वाट पहाणारं माझं मन उत्सुक अस्वस्थतेमुळे सतत बेचैनच असायचं.

असंच एक दिवस मी कामात व्यग्र असताना कुणाची तरी चाहूल लागली म्हणून मी मान वर करुन पाहिलं तर समोर माझे सासरे उभे होते! मी क्षणभर पहातच राहिलो त्यांच्याकडे न् भानावर येताच ताडकन् उठून उभा राहिलो. ते काय सांगतायत हे ऐकण्यासाठी माझे कान आतूर झाले होते पण उत्सुक मन मात्र आतल्याआत थरथरत होतं…. !!

“तुम्ही असे अचानक?”

“हो. खूप आनंदाची बातमी घेऊन आलोय. मुलगा झालाय… “

“आरती कशी आहे? आणि बाळ… ?”

“तिनेच ‘समक्ष जाऊन सांगून या’ म्हणत मला लगोलग पाठवलंय. बाळ गोड आहे. तीन किलो वजन आहे बाळाचं. घरी आईंनाही सांगा लगेच. मला निघायला हवं… “

” नाही नाही.. असं कसं?” मी म्हणालो. “घरी नाही तरी निदान समोरच्या रेस्टाॅरंटमधे काॅफी तरी घेऊया” म्हणत मी ड्राॅवर बंद केला तसं त्यांनी मला थांबवलं.

“नाही… खरंच नको. तुम्ही कामात आहात, व्यत्यय नको. मी शाहुपूरीत माझ्या बहिणीकडे जाऊन हा निरोप सांगणाराय. तिथं खाणंपिणं होईलच. म्हणून नको ” त्यांनी मला समजावलं. जायला वळले आणि कांहीतरी आठवल्यासारखं थांबले. त्यांनी खिशात हात घालून कागदाची एक घडी बाहेर काढली आणि…

” हे तुमच्या बायकोने दिलंय तुमच्यासाठी.. ” ते हसत म्हणाले आणि ती घडी माझ्या हातात देऊन निघून गेले..

 ती घडी उलगडून पाहिलं तर थरथरत्या हातानं लिहिलेली ती मोजक्या शब्दांची फक्त एक ओळ होती….

‘आपला.. समीर.. परत आलाय.. ‘

ते वाचलं आणि एक अनामिक अशी सुखसंवेदना माझ्या मनाला स्पर्शून गेली.. त्या स्पर्शाने मी शहारलो! कसाबसा खुर्चीत टेकलो. ओलसर नजरेने त्या अक्षरांवरून नजर फिरवीत त्या कागदाची अलगद घडी घातली आणि ती खिशात जपून ठेवली.. !

“आपल्याला पुन्हा मुलगा झाला तर आपला समीरच परत आलाय असंच तुम्ही म्हणणार…. पण मी.. ? तुम्हाला कसं सांगू? रात्री अंथरुणाला पाठ टेकली, अलगद डोळे मिटले कीं केविलवाण्या नजरेने माझ्याकडे पहात दोन्ही हात पुढे पसरत झेपावत असतो हो तोss.. आहे माहित? त्याचे टपोरे डोळे’ गोरा रंग’, लांबसडक बोटं, दाट जावळ… सगळं मनात जपून ठेवलंय हो मीss. आपल्याला मुलगा झालाच तर तो आपला समीरच आहे कीं नाही हे फक्त मीच ठरवणार… बाकी कुणीही नाहीss…. ” कधीकाळी आरतीच्याच तोंडून बाहेर पडलेले हे शब्द आणि त्यानंतरचं तिचं खऱ्याखोट्याच्या सीमारेषेवरचं घुटमळणं मला आठवलं आणि पूर्णतः नास्तिक असणारी तीच आज मला ‘आपला समीर परत आलाय’ हे अतिशय आनंदाने, मनापासून सांगत होती !! यापेक्षा वेगळं मला तरी दुसरं काय हवं होतं?

ही अतिशय करूण आणि तितक्याच भयावह अशा अरिष्टाची अतिशय सूचक अशी सांगताच आहे असं मला त्याक्षणी वाटलं खरं पण ते तेवढंच नाहीये हे मात्र तेव्हा माहित नव्हतं. पुढे जवळजवळ १४-१५ वर्षांचा प्रदीर्घ काळ लोटल्यानंतर एक दिवस अतिशय अकल्पितपणे मला समजलं ते या सगळ्या अघटीतामधे लपलेलं गूढ उकलणारं एक रहस्य.. !!

तोवर ‘समीर परत आलाय’ ही भावना आमच्या निखळ समाधानासाठी आम्हाला पुरेशी होती. पण तो कसा परत आला.. सगळं कां आणि कसं घडलं याची उकल मात्र झालेली नाहीय हे माझ्या गावीच नव्हतं. १५ वर्षांचा प्रदीर्घ काळ लोटल्यानंतर अगदी अकल्पितपणे ती उकल झाली.. आणि.. मी त्यातला थरार अनुभवताना माझ्या मनातल्या ‘त्या’च्यापुढे मनोमन नतमस्तक झालो… !!

क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ पिल्लू (सोडणे) ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? विविधा ?

☆ पिल्लू (सोडणे) ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

लेखाचं शीर्षक वाचून आश्चर्य वाटलं ना ! हा ‘ पिल्लू सोडणे ‘ काय प्रकार आहे हे मला खरोखरच काही वर्षांपूर्वी माहिती नव्हतं. पहिल्यांदा माझ्या एका मित्राकडून हा वाक्प्रचार मी ऐकला. मला त्या शब्दाची मोठी गंमत वाटली. मग मी कुतूहलाने त्याचे बोलणे ऐकत राहिलो. माझा हा मित्र एका राष्ट्रीयकृत बँकेत कामाला होता. त्याच्या बँकेत घडलेल्या गमतीजमती तो संध्याकाळी फिरायला जायचे वेळी मला सांगायचा. अमुक एक असं म्हणाला. तो तसं म्हणाला. काही लोकांकडे खूप कामं असायची. नेमून दिलेली कामं करणं त्यांच्या जीवावर यायचं. मग ते काहीतरी पिल्लू सोडून द्यायचे. दुसऱ्या शब्दात सांगायचं तर मॅनेजरला अशी काहीतरी गोष्ट सांगायचे की ती त्याला नाकारताही यायची नाही. म्हणजेच एखादी सांगयाची. ती गोष्ट मॅनेजर खरी मानून चालायचा आणि पुढे चालून ती प्रथा पडायची. म्हणजेच ते सोडून दिलेलं पिल्लू हळूहळू मोठं व्हायचं.

आपल्या अवतीभवती सुद्धा असे अनेक लोक आपण पाहतो. काहीही माहिती नसताना ते एखादं पिल्लू सोडून देतात. दुसऱ्या शब्दात सांगायचं तर ते अफवा पसरवण्याचं काम करतात. यालाच कोणी कंड्या पिकवणे असेही म्हणतात. असं एखाद्या गोष्टीचं पिल्लू सोडून देऊन हे लोक नामानिराळे होतात आणि मग आपण सोडून दिलेलं पिल्लू मोठं होताना पाहून त्यांना मोठी गंमत वाटते किंबहुना तो त्यांचा एक खेळच असतो. मग त्यामुळे कोणाला मनस्ताप झाला, कोणाचे नुकसान झाले तरी त्यांना पर्वा नसते किंबहुना तसे व्हावे हीच त्यांची सुप्त इच्छा असते. जाणाऱ्याचा जीव जातो पण पाहणाऱ्याचा खेळ होतो अशातला हा प्रकार !

एकदा सोडून दिलेले असे पिल्लू म्हणजे जणू काही अनाथ पोर ! त्याला ना आई, ना बाप ! मग ते हळूहळू मोठे होत जाते. ते कसेही वागले तरी त्याची जबाबदारी कोणावरच नसते. दुपारी माध्यान्हाच्या वेळेला पडणारी आपली सावली लहान असते, पण जसजशी संध्याकाळ होत जाते तसतशी ती मोठी होत जाते. तसेच हे पिल्लू ही सुरुवातीला लहान असते. नंतर मोठे होत जाते. पण सावलीमुळे कोणाचे नुकसान होत असल्याचे ऐकिवात नाही. फक्त भयपटात सावल्या भीती दाखवण्याचे काम करतात तो भाग वेगळा ! पण हे असली पिले मोठी झाली म्हणजे समाजाचे भयंकर नुकसान करतात.

कोरोनाच्या कालावधीत तर कितीतरी भयंकर अफवा पसरवण्यात आल्या किंवा पिल्लू सोडण्यात आले. त्यामुळे काही लोकांचा फायदा झाला असेलही पण बऱ्याच लोकांना त्याचा त्रास झाला. काहींनी नको त्या गोष्टी सांगून लोकांना घाबरवले कोणी अमुक एक औषध उपलब्ध नाही म्हणून अफवा पसरवली. कोणी काही तर कोणी काही. त्रास मात्र सगळ्यांना झाला.

सध्या जे दहा रुपयाचे नाणे चलनात आहे, त्याबद्दलही मध्यंतरी कोणीतरी पिल्लू सोडून दिलं होतं की हे नाणे बंद झाले आहे. आमच्या गावातील तर बऱ्याच लोकांनी ते दहा रुपयाचे नाणे घेणे बंद केलं होतं. बँकेतील लोकांना विचारले तर ते म्हणाले की असा कोणताही निर्णय रिझर्व बँकेने घेतला नाही शेवटी रिझर्व बँकेलाच असं जाहीर करावं लागलं की हे नाणं बंद केलेलं नाही, ते चलनात आहे. पण तोपर्यंत बऱ्याच लोकांना मनस्ताप सोसावा लागला होता.

हल्ली सोशल मीडिया हे कुठले तरी पिल्लू सोडून देण्याचे एक प्रभावी माध्यम झाले आहे लोकांच्या जातीय किंवा धार्मिक भावना भडकतील अशा प्रकारच्या अफवा सोशल मीडिया वरून बऱ्याच वेळा पसरवल्या जातात आणि मग पोलिसांना किंवा राज्य शासनाला अशा प्रकारच्या अफवा पसरवू नयेत किंवा नागरिकांनी त्यावर विश्वास ठेवू नये असे आवाहन करावे लागते. पूर्वी ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद झाल्यानंतर त्यांच्याबद्दलही विविध अथवा उठवल्या होत्या. अमुक एक तेल आरोग्यासाठी चांगलं आहे आणि अमुक एक तेल आरोग्यासाठी घातक आहे अशा प्रकारची खेळी तर आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी सर्वसामान्यांच्या जीवाशी अनेक वेळा खेळली आहे आणि आपले उखळ पांढरे करून घेतले आहे. शेंगदाणा तेल आरोग्यासाठी वाईट, खोबरेल तेल आरोग्यासाठी वाईट अशा प्रकारचा अपप्रचार त्यासाठी करण्यात आला. या सुद्धा एक प्रकारच्या अफवाच होत.

काही दिवसांपूर्वी जळगावजवळ एका रेल्वे अपघातात १२ जणांचा रेल्वेखाली चिरडून मृत्यू झाला. ही नुकतीच घडलेली घटना आहे. त्यालाही अशा प्रकारची अफवाच कारणीभूत होती. कोणीतरी अशी अफवा पसरवली की रेल्वेच्या डब्यात आग लागली आहे. लागलीच त्या डब्यातील प्रवाशांनी घाबरून रेल्वेबाहेर उड्या मारल्या. त्यावेळी गाडी एका रेल्वे वळणावरून धावत होती. विरुद्ध बाजूने वेगाने येणारी एक्सप्रेस लोकांना वळण असल्यामुळे दिसली नाही. त्यांनी बाजूच्या रेल्वे रुळावर उड्या घेतल्या आणि क्षणार्धात त्या गाडीखाली सापडून त्यांच्या शरीराच्या अक्षरशः चिंधड्या झाल्या. एखादी अफवा पसरवण्याचे परिणाम केवढे भयंकर होतात ! मग ती जाणूनबुजून पसरवलेली असो की नसो !

बऱ्याच वेळा अशा अफवा पसरवल्यामुळे दोन समाजामध्ये तेढ निर्माण होऊन जातीय दंगे घडल्याची अनेक उदाहरणे आहेत. अशा प्रकारची अफवा पसरवणारे हेतूपुरस्सर अशा अफवा पसरवतात आणि आपला अनिष्ट हेतू साधून घेतात. काही राजकीय व्यक्तींचा देखील अशा घटनांमध्ये सहभाग असल्याचे अनेक वेळा उघड झाले आहे. चित्रपटातूनही आपण अशा घटना पाहतो. त्यांनीही अशाच प्रकारे आपली पोळी भाजून घेतली आहे. पण याचे गंभीर परिणाम समाजाला भोगावे लागले आहेत त्याशिवाय समाजात दुफळी निर्माण होते ती वेगळीच ! बऱ्याच वेळा गर्दीच्या ठिकाणी मंदिरांमध्ये किंवा जत्रेत कोणीतरी काहीतरी अफवा पसरवतं आणि मग चेंगराचेंगरी होऊन हजारो लोकांचे बळी जातात. अशाही अनेक घटना आपण वर्तमानपत्रात वाचत असतो. पण समाज शहाणा होत नाही हे दुर्दैव !

म्हणून समाजाचे देखील एक कर्तव्य आहे, एक जबाबदारी आहे. ती म्हणजे अफवांवर विश्वास न ठेवणे. त्यासाठी आपल्याला पोलीस, विविध स्वयंसेवी संस्था, बँका वेळोवेळी आवाहन करीत असतातच. अशी एखादी संवेदनशील गोष्ट आपल्या कानावर पडली तर आपण त्यावर विश्वास न ठेवता त्या गोष्टीची खात्री करून घ्यावी आणि मगच योग्य ती पावले उचलावी. एक जबाबदार नागरिक म्हणून अशी खबरदारी आपण तर घेतलीच पाहिजे परंतु आपल्या मुलांना देखील अशा गोष्टींवर खात्री केल्याशिवाय विश्वास ठेवायचा नाही अशी शिकवण दिली पाहिजे. शाळा, कॉलेजेस मधून सुद्धा अशा प्रकारची जागृती घडवून आणणे आवश्यक आहे. आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आपण अफवा न पसरवण्याचा आणि खात्री केल्याशिवाय अशा अफवांवर विश्वास न ठेवण्याचा निश्चय करूया.

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ प्रेम केल्याने नेमके काय होते ?? – लेखक – डॉ. शिवानंद बासरे   ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? विविधा ?

🫀 प्रेम केल्याने नेमके काय होते ?? – लेखक – डॉ. शिवानंद बासरे  ☆  श्री सुहास रघुनाथ पंडित 

(Valentine’s DaY Special…)

नैसर्गिक निवड प्रक्रियेचा भाग असलेले ‘प्रेम’ हे मनुष्याचे सर्वाधिक निरोगी वर्तन आहे. विज्ञान म्हणते की, आपल्या भाव-भावना हे मेंदू, हृदय आणि शरीराच्या अन्य अवयवांवर थेट परिणाम करतात. असं काय असतं ह्या प्रेमात जे आपल्या आरोग्य-अनारोग्याचा अविभाज्य भाग आहे ? प्रत्येकाचे शरीर वय स्वभाव विचार परिस्थिती यानुसार ‘प्रेम’ वेगवेगळे असले तरी “तुमचं आमचं सेम असतं” असं का म्हणतात ??

रासायनिकदृष्ट्या मेंदूचा मनाशी संबंध असला तरी, प्रत्यक्षात मन हृदयाच्याच अधिक जवळ असते. प्रेमाचे प्रतीक दाखवायचे झाले तर आपण हृदयाचे चित्र काढतो. मनावर झालेले सर्व आघात हृदयावर थेट परिणाम करतात. प्रेमामुळे शरीरात ‘कोर्टिसोल’ नावाच्या Stress Hormone ची पातळी कमी होते. यामुळे हृदयगती कमी होऊन रक्त प्रवाह सुधारतो. अनावश्यक कॅलरीज बर्न होतात. तणाव दूर होऊन स्नायूंना आराम मिळतो.

प्रेमात Oxytocin चा स्तर वाढतो, जे लोकांना एकमेकांशी बांधण्याचे काम करते. जसं जन्मानंतर ताबडतोब आई आणि मुल एकमेकाशी जोडले जाते, अगदी तसेच नात्यात सुद्धा ऑक्सीटोसिन महत्वाची भूमिका निभावते. शांततेची भावना निर्माण होऊन रात्रीची झोप अधिक चांगली लागते. मनात आनंदाची भावना Dopamine मुळे निर्माण होते. यामुळे ऊर्जा, एकाग्रता वाढते आणि एकाकीपणाची भावना कमी होते. प्रेमात हे अगदी सहज घडते.

आता प्रश्न असा की, हे सर्व घडते ते कोणत्या प्रेमामुळे ? तारुण्यातील प्रेम की अन्य कोणते प्रेम ??

तसं प्रेम हा आजवरचा सर्वाधिक संदिग्ध शब्द आहे. शब्दात व्यक्त करणे अशक्य असले तरी त्यात सौंदर्य, समाधान, समज, निस्वार्थीपणा, परिपक्वता, काळजी, सामर्थ्य, सकारात्मकता यांचा समावेश आहे.

इतरांवरील प्रेमाची सुरुवात स्वतःवरील प्रेमाने होते. जे लोक स्वतःवर प्रेम करू शकत नाहीत, त्यांना इतरांवर प्रेम करणे कठीण जाते. प्रेम कसे करावे ? हे शिकणे तिथून सुरू होते. प्रेम करणे म्हणजे पुढच्या व्यक्तीचा जसा आहे तसा, त्याच्या गुण-दोषांसकट स्वीकार करणे.

असे केल्याने काय होते ? जगातील सर्वात अमूल्य गोष्ट आपल्याला लाभते, ते म्हणजे आंतरिक समाधान ! ज्याच्यासाठी आपण आयुष्यभर धडपडतो. जे मिळविण्यासाठी प्रत्येकजण सुचेल त्या मार्गाने अथक प्रयत्न करतो, ती गोष्ट आपल्याला प्रेम केल्याने सहज मिळते.

सध्याच्या बहुतांश जीवनशैलीजन्य आजारांची (उदा- वंध्यत्व, हृदयरोग, उच्च-रक्तदाब, मधुमेह, निद्रानाश इ. ) अनेकजण अनेक कारणे सांगत असले तरी, ‘प्रेमाचा अभाव’ हेही एक प्रमुख कारण त्यांच्या मुळाशी आहे. प्रेम हे तंत्रज्ञान वा औषध नसल्याने डॉक्टर ते लिहून देऊ शकत नाही, आणि ते विकतही मिळत नाही. अन्यथा या आजारांसाठी आयुष्यभर गोळ्या खाण्याची गरजच पडली नसती.

आज ‘व्हॅलेटाईन डे’ च्या निमित्ताने प्रेमाच्या संकुचित मानसिकतेतून बाहेर पडून स्वतःचे व इतरांचे आरोग्य सुधारण्याची आपल्याला सुसंधी आहे. मनात राम आहे हे दाखविण्यासाठी हनुमंतांनी स्वतःची छाती फाडून दाखविली. प्रेमाच्या मार्गाने असे हृदय आपण विकसित करू शकलो तर जन्माचे कल्याण होते. अन्यथा; जन्माला आला अन् मरून गेला… एवढेच घडते !

HàPPY Vålentine’s DåY

लेखक : डॉ. शिवानंद बासरे

दीर्घायु हॉस्पिटल, नांदेड- मो ९४२३२६७४९२

संकलन व प्रस्तुती : सुहास पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “बूमरँग” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

श्री कौस्तुभ परांजपे

? विविधा ?

☆ “बूमरँग” ☆ श्री कौस्तुभ परांजपे

शेवटी काल मी माझे प्रयत्न थांबवण्याचा निर्णय घेतला. प्रयत्न होता तो बायकोला टू व्हीलर शिकवण्याचा. यासाठी मी सगळे प्रयत्न केले.

तुला जमेल… तु शिकशील… तु करून दाखवशील… सोप्पं आहे ते… वाटतं तितकं कठीण नाही… मी आहे नां… फोर व्हीलर सारखं खूप किचकट नाही… किती दिवस तू माझ्यावर किंवा रिक्षावर अवलंबून राहशील… अशा प्रोत्साहन देणाऱ्या अनेक वाक्यांपैकी काही मी मनापासून ऐकवली… तर काही मनात नसतांना सुध्दा…

आता नवीन गाड्या आहेत. किक फार कमी वेळा मारावी लागते. बटन दाबलं की सुरू होते. पाय जमिनीवर टेकतील इतकीच उंची असते. आणि एक्सीलरेटर हळूहळू वाढवलं कि आपोआप पुढे जाते. असा अभ्यासक्रमाचा काही भाग तोंडी सांगून झाला होता.

थोडफार प्रात्यक्षिक सुध्दा सुरू झालं होतं. पण त्यात गाडी शिकण्यापेक्षा सुरुवातीला अडचण आली ती साइड मिररची…

ते गोल गोल आरसे काढून टाका, आणि दुसरे चांगले चौकोनी, उभे, आणि स्लिम असतील ते लावा… पहिली सुचना…

आता काय झालं मला काही सुचेना… का?… असं विचारण्याची मी हिंमत केली. तसंही बऱ्याचदा का?… असं हिंमत करुनच विचारावं लागतं…

त्या गोल आरशात मी गोल गोलच दिसते…

अगं पहिला मुद्दा तो आरसा आपल्या स्वत:ला पाहण्यासाठी नसतोच. मागून कोण येतय हे पाहण्यासाठी व अंदाज घेण्यासाठी असतो. आणि असंही बाहेर पडतांना तु मोठ्या, पूर्ण उंचीच्या, आणि गोल नसलेल्या आरशात पाहूनच बाहेर पडतेस नां. मग परत त्या छोट्या आरशात स्वत:ला पाहण्याची काय गरज… आणि आरसा जे आहे तसंच काहीसं दाखवण्याचा प्रयत्न करतो… शेवटचं वाक्य मी हळूच म्हंटल. तरीसुद्धा माझा चेहरा चौकोनी आणि तिचा गोल झाला आहे असं उगाचच पण खरं तेच वाटल…

मागून कोण येतंय हे पाहण्यासाठी व अंदाज घेण्यासाठी आरसा असतो हे वाक्य तिला पाठ झाल्यामुळे तिसऱ्या दिवशीच्या प्रात्यक्षिकात ती गाडी चालवत असतांनाच तिने गाडीचा वेग कमी केला, आणि थोडी बाजूला करून उभी राहिली…

आता काय झालं?… माझा प्रश्न..

काही नाही, आरशात एक बाई मागून येते आहे ती दिसली… म्हणून…

तीला पुढे जायचं असेल तर ती जाईल नां… तितकी जागा आहे… पण तु वेग कमी करत बाजूला गाडी थांबवली हे मस्त…

प्रश्न तिला जायला जागा आहे का नाही याचा नाहीच… तिची साडी मस्त आहे… कुठली आहे… आणि पदर कसा आहे हे बघायचं आहे‌… त्या बाईंच सोडा, पण या आरशात साडी काही नीट दिसलीच नाही…

मी निरुत्तर…

पण या थांबण्यामुळे तिने साडी सह बाईंकडे… आणि मी त्या… बाईंसह साडीकडे पाहून घेतलं…

पण या कारणांमुळे मी माझे प्रयत्न सोडले असं नाही. त्याला कारण वेगळंच होतं…

आज सुटिचा दिवस होता. रोज दोघांच सकाळी कामावर जाणं. सकाळचं जेवण डब्यात. यामुळे घरी नाश्ता हा प्रकार जवळपास नसतोच. आज मी सहज म्हटलं. खायला जरा पोहे करा… वर मस्त नारळाचा किंवा खोबऱ्याचा किस… कोथिंबीर… लिंबू… मजा येइल…

त्यावर उत्तर आलं… हं तो वरचा डबा घ्या… पोहे आहेत त्यात… चाळणीने चाळून घ्या… थोडे भिजवा… दोनचार मिरच्यांचे तुकडे करा… बाकी फोडणी, मीठ, हळद हे मी सांगते… आणि खोबऱ्याचं पण बघते…

एखाद्या गोष्टीचं खोबरं होण म्हणजे काय असतं, ते मला समजलं…

येवढ्यावरच ते बोलणं थांबलं नाही, तर फक्त रिक्षेचा उल्लेख सोडला तर माझी वाक्य…

तुला जमेल… तु शिकशील… तु करून दाखवशील… सोप्पं आहे ते… वाटतं तितकं कठीण नाही… मी आहे नां… हि वाक्य तशीच, तेवढ्याच तन्मयतेने आणि उत्साहाने मलाच ऐकून दाखवली…

यात परत फोर व्हीलर सारखं किचकट नाही, या माझ्या वाक्याप्रमाणे पाकातले चिरोटे करण्याइतकं किंवा अनारशा सारखं किचकट नाही… असं पण ऐकाव लागलं.

आणि मी माझे शिकवण्याचे प्रयत्न सोडून द्यायचे ठरवलं… तिला फक्त गाडी शिकवायची होती… पण मला बरंच काही शिकावं लागलं असतं… शिकवणं कठिण असेल पण शिकणंही सोप्पं नसतं…

आता काय?… तिने पोहे करायला घेतले आहेत… आणि पोहे खाऊन झाल्यावर तिला एका ठिकाणी जायचं आहे तिथे सोडायला मी…

©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “ह्याचा इन्श्युरन्स निघत नाही” ☆ श्री मयुरेश उमाकांत डंके ☆

श्री मयुरेश उमाकांत डंके

? विविधा  ?

☆ “ह्याचा इन्श्युरन्स निघत नाही” ☆ श्री मयुरेश उमाकांत डंके ☆

माझा एक दुकानदार मित्र आहे. वडिलोपार्जित व्यवसायात आहे. कधीही येता जाता त्याच्या दुकानापाशी हात करताना मला दुकानाबाहेर ठेवलेले उंदरांचे दोन पिंजरे दिसतात. पण त्यात पकडले गेलेले उंदीर मात्र कधी दिसले नाहीत. मी त्याला एकदा सहज विचारलं, “बाबा रे, आजतागायत एकदा तरी उंदीर सापडला का पिंजऱ्यात?” तो हसून म्हणाला,” दुकान सुरुवातीला नवं होतं,तेव्हां सहा महिने उंदीर सापडायचे. नंतर पुन्हा कधी सापडले नाहीत. सगळे उद्योग करुन झाले. भजी ठेवली,कॅडबरी ठेवली,चीज क्यूब्ज ठेवून पाहिले,नॉनव्हेजचे तुकडे ठेवून बघितले. पण हे उंदीर अफाट हुशार झालेत. त्यांच्या आवडीची कुठलीही गोष्ट त्यात ठेवा,तो सापळा आहे,हे त्यांना अगदी बरोबर समजतं. ते सगळ्या दुकानात धुडगूस घालतात, पण सापळ्याकडे फिरकतच नाहीत. मी आपला रित म्हणून रोज मोठ्या आशेनं पिंजरा लावूनच दुकान वाढवतो.” मीही हसण्याचा आनंद घेऊन त्याचा निरोप घेतला. पण त्याचं वाक्य मात्र डोक्यात घुमत राहिलं – आजकालचे उंदीरसुद्धा हुशार झालेत…!

असाच एक दुसरा प्रसंग माझ्या अगदी चांगला लक्षात राहिला आहे. आमच्या दारी गायींसाठी एका मोठ्या सिमेंटच्या पात्रात पाणी ठेवलेलं असतं. उन्हाळ्यात अनेकदा गायी फार लांबून लांबून पाण्यासाठी येतात. त्या कुणालाही कसलाही त्रास देत नाहीत. त्या येतात आणि पाणी पिऊन शांतपणे निघून जातात. पण एकानं त्या गायींना हुसकून लावण्याचा उद्योग सुरु केला. दगड मारणे, काठीने मारणे असे प्रकार सुरु केले. गायींचं त्यांच्या दारात थांबणं बंद झालं. आमच्याकडे येऊन पाणी पिऊन जायच्या. पुढं एका दिवाळीत वसुबारसेच्या दिवशी मी गायींना खाऊ घालत होतो, तेव्हां तेच गृहस्थ पुरणाची पोळी घेऊन आले आणि गायीला खाऊ घालण्याचा प्रयत्न करु लागले. त्या गायीनं बाकी सगळ्यांचे गोग्रास घेतले, पण ह्यांच्याकडे ढुंकूनही न पाहता शांतपणे निघून गेली. गायीसुद्धा हुशार झाल्यात..!

हीच गोष्ट मधमाशांची आणि मुंग्यांची. एखाद्या ठिकाणी त्यांच्या जिवाला धोका असेल तर त्या ठिकाणी त्या वसत नाहीत. उलट त्या त्यांची अधिकाधिक सुरक्षितता शोधतात. माणसांचा उपद्रव होणार नाही, याची पूर्ण दक्षता घेतात. ‘लक्ष्मणरेषा’ नावाचा मुंग्यांचा उपद्रव टाळण्यासाठी उपयुक्त असा खडू मिळतो. त्याच्या रेषा धान्याच्या पोत्याभोवती मारल्या तर मुंग्या त्या बाजूनं फिरकत नाहीत. पण त्यावरचा मार्ग बरोब्बर शोधून काढतात. एकदा उन्हात आईनं वाळवणं घातली होती आणि बाजूनं लक्ष्मणरेषा मारल्या होत्या. पण मुंग्या असल्या बिलंदर की, त्यांनी गच्चीत पडलेलं एक छोटंसं वाळकं भुईमुगाच्या शेंगेचं टरफल ढकलत आणलं आणि त्या रेषेवर ठेवून वेढा फोडला. संध्याकाळी उन्हं कलल्यावर गोळा करायला गेलो तर सगळा प्रताप लक्षात आला. पण तोवर मुंग्यांचा डाव बऱ्यापैकी यशस्वी झाला होता. म्हणजे, मुंग्यासुद्धा शहाण्या झाल्यात..!

प्रश्न आहे तो आपण माणसांचाच..! पर्यावरणातला सर्वात बुद्धिमान प्राणी असूनसुद्धा जगण्यासाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक असणारं शहाणपण माणसाला का मिळवता येत नाही? स्वतःच्या बुद्धीचा वापर करुन मार्ग काढता येत नसेल तर किमान इतरांच्या अनुभवातून तरी योग्य तो बोध मनुष्यप्राणी का घेत नाही? ‘जब वुई मेट’ नावाच्या हिंदी सिनेमात भर रात्री अनोळखी प्रवाशाचा शोध घेण्यासाठी रेल्वेतून उतरलेल्या करिना कपूरला वयानं तिच्याहून वडील असणारा स्टेशन मास्तर “अकेली लडकी खुली हुई तिजोरी की तरह होती है” हे सांगत असतो. पण “यह ग्यान मुफ्त का है या इसके पैसे चार्ज करते हैं? क्योंकी चिल्लर नहीं है मेरे पास” असं मोठ्या तोऱ्यात सुनावणाऱ्या त्या करिना कपूरच्या तोंडचं ते वाक्य आपल्याला विनोदी वाटतं. पण त्या स्टेशन मास्तरच्या सांगण्यातली काळजी एकालाही दिसत नाही,जाणवत नाही. हाच तर आपल्या माणसांच्या शहाणपणातला उसवलेला टाका आहे.

रात्री तीन वाजता कुणालाही न सांगता, मित्रांसोबत घराबाहेर भटकणारी तरुण मुलंमुली दिसणं पुणेकरांना नवीन नाही. पावसाळ्यात कुणालाच न सांगता, कॉलेजला दांडी मारुन, खोटं बोलून परस्पर लोणावळा, भुशी डॅम, ताम्हिणी घाट अशा ठिकाणी भटकणारी मुलंमुली खरोखरच व्यवहारज्ञानी असतात का? सेल्फी काढण्याच्या नादात कड्यावरून कोसळलेली मुलं मुली, धोकादायक धबधब्यात उतरलेली माणसं खरोखरच प्रॅक्टिकली शहाणी असतात का? हा प्रश्न माझ्यासारखाच अनेकांना पडत असेल.

“आईवडील म्हणजे आपले सर्वात मोठे शत्रू” असं वाटणाऱ्या तरुण पिढीची आपल्या समाजात मुळीच वानवा नाही. मुलांच्या आयुष्यात घडणाऱ्या कित्येक गोष्टी अनेकांना ठाऊक असतात, पण त्यांच्या पालकांनाच ठाऊक नसतात. कित्येकांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर त्यांचे पालक ॲड नसतात. आपल्या मुलामुलींचं मित्र-मैत्रीण मंडळ पालकांना माहितच नसतं. आपल्या आयुष्यात काहीही घडलं तरी घरच्यांना सांगावंसं मुलांना का वाटू नये? हा खरोखरच काळजीचा मुद्दा आहे. आपल्याच परिवारातल्या माणसांपासून मुलंमुली गोष्टी लपवून का ठेवतात? अत्यंत महत्वाच्या गोष्टींबाबत सुद्धा आईवडीलांपेक्षा त्यांना मित्र अधिक जवळचे का वाटतात? आपल्या आयुष्यातली अत्यंत मोठी घटना घडल्यानंतर सुद्धा मुलंमुली पहिला फोन आपल्या पालकांना का करत नाहीत? या प्रश्नाचं उत्तर गांभीर्यानं शोधलं पाहिजे.

नागरिकशास्त्र हा विषय १०० गुणांचा केला पाहिजे,असं आता अनेकांना वाटतं. ते समाजातली एकूण परिस्थिती पाहता खरंच आहे. पण त्याहीआधी व्यवहारज्ञानाचं आणि स्वतःची सुरक्षितता जपण्याचं शिक्षण आपल्या कुटुंबातूनच मुलामुलींना मिळणं नितांत आवश्यक आहे. जगण्यातलं शहाणपण शिकण्यासाठी मुंग्या,उंदीर,गायी किंवा अन्य प्राणिमात्र कुठल्याही वेगळ्या व्यवस्थेकडे जात नाहीत. त्यांना ते शिक्षण त्यांच्या पालकांकडून मिळतं. मधमाशा सुद्धा त्यांची कुटुंब प्रमुख असलेल्या राणीमाशीचं ऐकतात. जगण्यातली शिस्त मोडत नाहीत. मन मानेल तसं वागत नाहीत किंवा वडीलधाऱ्यांचं सांगणं धुडकावून सुद्धा लावत नाहीत. त्यांच्या जगण्यातले निसर्गधर्म आणि परिवार व्यवस्था ते पूर्ण निगुतीनं आणि आदरानं जपतात, मोडीत काढत नाहीत.

आईवडील आणि कुटुंबातल्या अन्य मोठ्या माणसांच्या संपर्कात राहणं, त्यांच्याशी चांगला संवाद असणं, वागण्याबोलण्यात पारदर्शकता असणं म्हणजे बिनकोठडीचा तुरुंगवास नसतो. उलट तेच आपल्यासाठीचं अतिशय सुरक्षित आणि सहृदय वातावरण असतं, हे शहाणपण आपण माणसं कधी शिकणार? कारण, जगण्यातलं शहाणपण नसल्यापोटी जी किंमत मोजावी लागते, तिचा इन्श्युरन्स निघत नसतो..!

© श्री मयुरेश उमाकांत डंके

मानसतज्ज्ञ, संचालक-प्रमुख, आस्था काऊन्सेलिंग सेंटर, पुणे.

 8905199711, 87697 33771

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ओंजळ… ☆ सौ शालिनी जोशी ☆

सौ शालिनी जोशी

 

🔅 विविधा 🔅

ओंजळ☆ सौ शालिनी जोशी

कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती।

करमुले तू गोविंदम् प्रभाते कर दर्शनम्।।

सकाळी झोपेतून जागे झाल्यावर आपण दोन मिनिटे अंथरुणावर बसून वरील श्लोक म्हणतो. यावेळी आपण दोन्ही हात एकमेकांना चिकटवून त्याची ओंजळ करतो. त्यावर लक्ष स्थिर करून त्यामध्ये सामावलेल्या लक्ष्मी आणि सरस्वती आणि गोविंद यांचे दर्शन घेतो. त्यांची आठवण ठेवून हाताने दिवसभर कार्य करण्याची जणू आपण प्रतिज्ञा करतो. लक्ष्मी आणि सरस्वती यांना प्राप्त करण्याचे सामर्थ्य तो गोविंद करमुले स्थित होऊन आपणाला देतो. असे हे ओंजळीचे महत्त्व तीनही देवांचे वरदान ओंजळीत आपण सामावून घेतो. त्यामुळे सर्व दिवस सार्थकी लागतो.

ओंजळ म्हटलं की समोर येते पारिजातकाच्या किंवा मोगऱ्याच्या फुलांनी भरलेली ओंजळ. ओंजळीत ही फुले अलगदपणे सांभाळली जातात. त्याच्या कोमल पणाला कोणताही धक्का लागत नाही. देवाला फुले वाहताना ओंजळीने वाहतात. ओंजळ मोकळी झाली तरी सुगंध टिकून राहतो. कोणाला दान द्यायचे झाले तरी देणाऱ्याच्या ओंजळीने घेणाऱ्याच्या ओंजळीत दिले जाते. खूप तहान लागली तरी ओंजळभर पाणी समाधान करते. सूर्याला अर्ध देताना ओंजळीने देतात. हात उंचावून ओंजळभर पाणी त्याला अर्पण करतात. सवाष्णीची किंवा देवीची ओटी भरताना ओंजळीतून तांदूळ सुपारी ओटीत घालतात. लाजलेली स्री आपले तोंड ओंजळीत लपविते, तर दुःखी स्त्री ओंजळीत आपल्या अश्रूंना वाट करून देते. ओंजळीत आपण देवाचा प्रसाद घेतो. प्रियजनांचे हात ओंजळीत घेतल्यावर वेगळ्या प्रेमाची अनुभूती येते. कोणाला धीर देतानाही दोन्ही करतल आपल्या करतलात घतले की दिलासा मिळतो. या अंजलीचे दोन्ही हात जेव्हा जवळ येतात तेव्हा नमस्कार होतो. मिटलेली ही ओंजळ नम्रता शिकवते. अशा प्रकारे ओंजळ भासते छोटी पण असते मोठी. हेच दातृत्वाचे रूप, भावनेचे द्योतक. स्वीकारायला ओंजळ तशी द्यायलाही. ती रिती होत नाही, भरत असते कधी सुखदुःखाने तर कधी आशीर्वादाने.

एखादा मानी म्हणतो मी कोणाच्या ओंजळीने पाणी पिणार नाही. म्हणजे दुसऱ्याच्या पदरचे खाणार नाही. ओंजळीला अंजली असेही म्हणतात. तर ज्ञानेश्वर ‘अंजुळी’ म्हणतात. अकराव्या अध्यायाचे शेवटी ते म्हणतात,

भरुनी सद्भावाची अंजुळी। मिया ओविया फुले मोकळी।

अर्पिली अंघ्रियुगूली ।विश्वरूपाच्या।।

११/७०८

ज्ञानेश्वरांची ओंजळ ही सदभावाची आहे आणि ती ओव्या रुपी फुलांनी भरली आहे. विश्वरूपाच्या चरणांवर त्यांनी ती मोकळी केली आहे अर्पण केली आहे. ण

निसर्गाच्या रुपाने परमेश्वर असेच आपल्याला भरभरून देत असतो. घ्यायला आपली ओंजळ अपुरी होते.

अनंत हस्ते कमलाकराने

देता किती घेशील दो कराने।

©  सौ. शालिनी जोशी

संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया  टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.

मोबाईल नं.—9850909383

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग ४५ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग ४५ ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र- आरती खऱ्या खोट्याच्या सीमारेषेवर घुटमळत होती… “समीरच्या सगळ्या आठवणी मनात रुतून बसल्यात हो माझ्याs. रात्री अंथरुणाला पाठ टेकली तरी मिटल्या डोळ्यांसमोर हात पुढे पसरुन माझ्याकडे येण्यासाठी झेपावत असतो तोss! आपल्याला मुलगा झाला तर तो समीरच आहे कां हे फक्त मीच सांगू शकेन.. तुम्ही कुणीही नाहीss.. ” भावनावेगाने स्वतःलाच बजावावं तसं ती बोलली आणि ऊठून आत निघून गेली.. !!

आता या सगळ्यातून बाहेर पडायला ‘लिलाताई’ हे एकच उत्तर होतं! जावं कां तिच्याकडे?भेटावं तिला? बोलावं तिच्याशी?.. हो.. जायला हवंच…!…

मी पौर्णिमेची आतुरतेने वाट पाहू लागलो…!)

तिच्याकडे जायचं. तिला भेटायचं. तिच्याशी मोकळेपणाने बोलायचं. समीरबाळाच्या जाण्यानंतरचं पुत्रवियोगाच्या दु:खानं झाकोळून गेलेलं माझं मन:स्वास्थ्य आणि नंतर तिच्या पत्रातील माझं सांत्वन करणाऱ्या आशेच्या किरणस्पर्शाने स्थिरावलेलं माझं मन.. हे सगळं कोणताही आडपडदा न ठेवता सांगून टाकायचं… असं सगळं मनाशी ठरवूनच मी त्या पौर्णिमेच्या दिवशी घराबाहेर पडलो. नृसिंहवाडीला जाऊन आधी दत्तदर्शन घेऊन थेट कुरुंदवाडची वाट धरली. तिच्या घराबाहेर उभा राहिलो आणि मनात चलबिचल सुरु झाली. तिचेही वडील नुकतेच तर गेलेत. तीसुध्दा त्या दु:खातच तर असणाराय. तिला आपलं दुःख सांगून त्रास कां द्यायचा असंच वाटू लागलं. मग तिला कांही सांगणं, विचारणं मनातच दडपून टाकलं. तेवढ्यांत दार उघडून दारात तीच उभी. आनंदाश्चर्याने पहातच राहिली क्षणभर….

“तू.. ! असा अचानक?.. ये.. बैस.. ”

ती मोकळेपणाने म्हणाली. आतून पाण्याचं तांब्याभांडं आणून माझ्यापुढे ठेवलंन्.

“लिलाताई, मी आज आधी न कळवता तुला भेटायला आलो ते दोन कारणांसाठी.. ” मी मुद्द्यालाच हात घातला.

“होय? म्हणजे रे.. ?”

“समीरचं आजारपण, त्याचं जाणं.. हे सगळं घडलं नसतं तरी मी तुमचे नाना गेल्याचं समजल्यावर तुला भेटायला आलो असतोच हे एक आणि समीर गेल्याचं तुला माझ्या आईकडून समजल्यानंतर तू सांत्वनाचं जे पत्र पाठवलं होतंस ते वाचताच क्षणी मला जो दिलासा मिळालाय त्याबद्दल तुझ्याशी समक्ष भेटून बोलल्याशिवाय मला चैनच पडत नव्हतं म्हणूनही आलोय. “

“नाना गेल्याचं समजलं तेव्हा तू न् आरती दोघेही माझ्या आईला भेटायलाही गेला होतात ना? आईनं सांगितलंय मला. “

“हो. त्यावेळी खूप कांही सांगत होत्या त्या मला. विशेषत: तुझ्याबद्दलच बरंचसं… “

“आईपण ना… ! माझ्याबद्दल काय सांगत होती?”

“माझ्या बाबांसारखी

तुलाही वाचासिद्धी प्राप्त झालीय असं त्या म्हणत होत्या. “

ती स्वत:शीच हसली. मग क्षणभर गंभीर झाली.

“माझी आई भोळीभाबडी आहे रे. तिला आपलं वाटतं तसं. बोलाफुलाला गाठ पडावी असेच योगायोग रे हे. बाकी कांही नाही… “

“माझे बाबाही असंच म्हणायचे. पण ते तेव्हढंच नव्हतं हे तू स्वत:ही अनुभवलंयस”

तिने चमकून माझ्याकडं पाहिलं. काय बोलावं तिला समजेना. मग विचारपूर्वक स्वतःशी कांही एक ठरवल्यासारखं ती शांतपणे म्हणाली,

“आईनं तुला जे सांगितलं ते योगायोगाने घडावं तसंच तर होतं सगळं. ते ज्यांच्या बाबतीत घडलं ते आमचे नाना आणि माझा मोठा भाऊ आण्णा यांच्यासंबंधातलं. जायच्या आधी नाना आठ दिवस खूप आजारी होते. तब्येतीच्या बाबतीत चढउतार सुरूच असायचे. मुद्दाम सवड काढून असंच एकदा आम्ही दोघेही त्यांना भेटायला गेलो होतो. पण तेव्हा ते पूर्णतः ग्लानीतच होते. आम्ही येऊन भेटून गेलोय हे त्यांना समजलंही नाहीये ही रुखरुख तिथून परत येताना माझ्या मनात रुतूनच बसली होती जशीकांही. मला स्वस्थता कशी ती नव्हतीच. अंथरुणाला पाठ टेकली की मनात विचार यायचे ते नानांचेच. ते कसे असतील? ते बरे होतील ना? हे असेच सगळे. त्यादिवशी रात्री डोळा लागला होता तोही याच मानसिक अस्वस्थतेत. आणि खूप वेळाने जाग आली ती डोअरबेल वाजल्याच्या आवाजाने. हे घरी नव्हते. कांही कामासाठी परगावी गेले होते. ते परत यायला अद्याप एक दोन दिवस अवकाश होता. तरीही तेच आले असतील कां असं मला वाटलं न् बेल दुसऱ्यांदा वाजली तशी मी पटकन् उठलेच. दार उघडून पाहिलं तर दारात नाना उभे. माझा माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसेना…

“नानाs, तुम्ही.. ? असे एकटेच.. ? बरे आहात ना?.. “

“हो अगं. काल वाडीला दर्शनाला आलो होतो. आज परत जायचंय. जाण्यापूर्वी तुला भेटून जावं असं वाटलं म्हणून आलोय. “

“बरं झालं आलात. बसा हं. मी पाणी देते न् चहा करते लगेच. “

“एs.. तू बस इथं. मी तुला भेटायला आलोय. चहा प्यायला नाही. मला जायचंय लगेच.. “

मी थोडावेळ बसले. बोलले त्यांच्याशी. मग चहा करायला म्हणून उठले. आत जाऊन पाण्याचं तांब्याभांडं घेऊन बाहेर आले तर नाना तिथं नव्हतेच. दार सताड उघडंच. मला भास झाला कीं स्वप्नच हे?.. असा विचार मनात आला तेवढ्यांत फोनची रिंग वाजली. फोन आण्णाचा.. मोठ्या भावाचा होता. नाना नुकतेच गेलेत हे सांगणारा.. !!

पहाटेचे पाच वाजले होते. ऐकलं आणि सरसरुन काटाच आला अंगावर.. ! सोफ्याचा आधार घेत कशीबशी खुर्चीवर टेकले.

ते स्वप्न नव्हतं. तो भासही नव्हता. नाना खरंच आले होते. त्यांची भेट न झाल्याची त्या दिवशीची माझ्या मनातली रूखरुख कमी करण्यासाठी ते जाण्यापूर्वी खरंच इथे येऊन मला भेटून गेले होते. हे एरवी कितीही अशक्य, असंभव, अविश्वसनीय वाटेल असं असलं तरी माझ्यापुरतं हेच सत्य होतं! नाना जाताना मला भेटून लाख मोलाचं समाधान देऊन गेले होते हेच माझ्यासाठी ते गेल्याच्या दु:खावर फु़ंकर घालणारं होतं.. !!”

मी भारावल्या सारखा ऐकत होतो.

“आणि.. तू आण्णाच्या दीर्घ आजारपणात त्याला दिलेल्या औषधाने तो झटक्यात बरा झाला असं तुझ्या आई सांगत होत्या त्याचं काय?तो चमत्कार नव्हता?”

“नाना गेले त्याआधीच्या चार-पाच महिन्यांपूर्वीची ती गोष्ट. मी अशीच नानांनाच भेटायला माहेरी गेले होते. तेव्हाच्या गप्पांत आईनेच आण्णाच्या आजारपणाबद्दल सांगितलं होतं. ते आजारपण वरवर साधं वाटलं तरी आण्णासाठी मात्र असह्य वेदनादायी होतं. दुखणं म्हणजे एक दिवस त्याच्या हातापायांची आग व्हायला सुरुवात झाली आणि हळूहळू ती अंगभर पसरली. डॉक्टरांची औषधं, इतर वेगवेगळे उपाय सगळं होऊनही गुण येत नव्हता. तो रात्रंदिवस असह्य वेदनांनी तळमळत रहायचा. आईकडून हे ऐकलं त्याक्षणी मी थक्कच झाले. कारण कालच मला एक स्वप्न पडलं होतं. ते असंबध्दच वाटलं होतं तेव्हा पण ते तसं नव्हतं जाणवताच मला आश्चर्याचा धक्काच बसला.

“आई, तुला खरं नाही वाटणार पण कालच मला एक स्वप्न पडलं होतं. स्वप्नांत आण्णा माझ्या घरी आला होता. त्याला काय त्रास होतोय ते सगळं अगदी काकुळतीने मला सांगत होता. ‘कांहीही कर पण मला यातून बरं कर’ असं विनवीत होता. मी त्याला दिलासा दिला. ‘माझ्याकडे औषध आहे ते लावते. तुला लगेच बरं वाटेल’ असंही मी म्हटलं. परसदारी जाऊन कसला तरी झाडपाला घेऊन आले. तो पाट्यावर बारीक वाटून त्याचा लेप त्याच्या सगळ्या अंगाला लावून घ्यायला सांगितलं आणि तो लेप लावताच आण्णा लगेच बराही झाला… ” मी हे सगळं आईला सांगितलं खरं पण तो झाडपाला कसला हे मात्र मला आठवेना. त्यांना काटेही होते. ती पानं चिंचेच्या पानासारखी होती पण चिंचेची पानं नव्हती कारण चिंचेच्या झाडाला काटे नसतात. तिथून परत आल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळी मी आणि हे दोघेही नेहमीप्रमाणे सकाळी नित्यदर्शनासाठी नृ. वाडीला जाऊन परतीच्या वाटेवर आम्ही नेहमी पाच मिनिटं एका पारावर बसायचो तसे बसलो. बोलता बोलता हाताला चाळा म्हणून त्या पारावर पडलेल्या वाळक्या काड्या उचलून मी मोडत रहायचे. त्यादिवशीही तसं करत असताना बोटाला एक काटा टोचला. पाहिलं तर त्या काडीवरचा वाळलेला पाला चिंचेच्या पानांसारखाच दिसला. मी नजर वर करून त्या झाडाकडे पाहिलं. ते शमीचं झाड होतं. शमी औषधी असते हे ऐकून माहित होतं म्हणून मी आण्णाच्या घरी फोन करून वहिनीशी बोलले. रोज शमीचा पाला वाटून त्याचा लेप लावायला सांगितलं. ती रोज तो लेप आण्णाला लावू लागली आणि तीन दिवसांत त्याचा दाह पूर्ण नाहीसा झाला. ” लिलाताई म्हणाली.

सगळं ऐकून मी पूर्णत: निश्चिंत झालो.

“लिलाताई, मला दिलासा देणारा असाच एक चमत्कार माझ्याही बाबतीत घडलाय. “

“कसला चमत्कार?” तिने आश्चर्याने विचारलं.

“तू मला पाठवलेलं ते सांत्वनपर पत्र हा चमत्कारच आहे माझ्यासाठी. ” मी म्हंटलं. तो कसा ते तिला सविस्तर समजावून सांगितलं.

” समीरचा आजार असा बरा होण्याच्या पलिकडे गेला होता‌. ते आमच्या घरीही माझ्या खेरीज कुणालाच माहित नसताना तुला नेमकं कसं समजलं? याचं आश्चर्य वाटतंय मला. कारण ‘समीरचा आजार पृथ्वीवरच्या औषधाने बरा होण्याच्या पलिकडे गेलेला असल्याने तो बरा होऊन परत येण्यासाठी देवाघरी गेलाय यावर विश्वास ठेव’ असं तू लिहिलं होतंस. आठवतंय? हे अशाच शब्दात लिहिण्याची बुद्धी तुला कशी झाली ही उत्सुकता आहे माझ्या मनात. “

हे सगळं ती भान हरपून ऐकत होती. मी बोलायचं थांबलो तशी ती भानावर आली. शांतपणे उठली आणि आत गेली. ती येईल म्हणून मी वाट पहात राहिलो. मग उठून उत्सुकतेने आत डोकावून पाहिलं तर ती देवापुढे हात जोडून बसलेली आणि तिच्या मिटल्या डोळ्यांतून अश्रू ओघळत होते. काय करावं ते न समजून मी खाल मानेनं बाहेर आलो. तिची वाट पहात बसून राहिलो. कांही क्षणात ती बाहेर आली. अंगाऱ्याचं बोट माझ्या कपाळावर टेकवलंन.

“तुझ्या डोळ्यांत पाणी का गं? माझं कांही चुकलं कां?”.

“नाही रे. तुझं कांहीही चुकलेलं नाहीय. मी रडत नाहीय अरे, हे समाधानाचे, कृतार्थतेचे अश्रू आहेत. “

“म्हणजे?”

“तुझ्या आईकडून समीर गेल्याचं मला समजलं त्या क्षणापासून खूप अस्वस्थ होते रे मी. तू हे सगळं कसं सहन करत असशील याच विचाराने व्याकुळ होते. घरी येताच सुचतील तसे चार शब्द लिहून पत्र पोस्टात टाकलं तेव्हा कुठे थोडी शांत झाले होते. खरं सांगू? मी काय लिहिलं होतं ते विसरूनही गेले होते. आज तू आलास, मनातलं सगळं बोललास तेव्हा ते मला नव्यानं समजलं. समीरचा आजार पृथ्वीवरच्या औषधाने बरे होण्याच्या पलीकडे गेलेला असल्याचं शप्पथ सांगते मला नव्हतं माहित. ते सगळं ‘मी’ लिहिलेलं नव्हतंच तर. ते दत्तगुरुंनी माझ्याकडून लिहून घेतलं होतं हे आज मला समजतंय. त्यांना दिलासा द्यायचा होता तुला आणि त्यासाठी मध्यस्थ म्हणून मी त्यांना योग्य वाटले हे लक्षात आलं आणि मी भरून पावले. सगळं कसं झालं मला खरंच माहित नाही. पण हा दत्तगुरुंचाच सांगावा आहे असं समज आणि निश्चिंत रहा.. !”

सगळं ऐकलं आणि मी पूर्णत: निश्चिंत झालो.

तिचा निरोप घेऊन मी बाहेर पडलो. मन शांत होतं पण… या सगळ्या अघटीतामागचं गूढ मात्र उकललं नव्हतंच. ते माझ्या मनातल्या दत्तमूर्तीच्या चेहऱ्यावरील स्मितहास्यात लपून अधिकच गहिरं होत चाललं होतं!!

क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares