मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग ५१ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग ५१ ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र – ही घटना म्हणजे – दत्तसेवेबद्दलची नकळत माझ्या मनावर चढू पहाणारी सूक्ष्मशा अहंकाराची पुटं खरवडून काढण्याची सुरुवात होती हे त्या क्षणी मला जाणवलं नव्हतंच. पण आम्हा सगळ्यांचंच भावविश्व उध्वस्त करणाऱ्या पुढच्या सगळ्या घटनाक्रमांची पाळंमुळं माझ्या ताईच्या श्रद्धेची कसोटी बघणारं ठरलं एवढं खरं! त्या कसोटीला ताई अखेर खरी उतरली पण त्यासाठीही तिने पणाला लावला होता तो स्वतःचा प्राणपणाने जपलेला स्वाभिमानच!!)

“हे गजानन महाराज कोण गं?” त्यादिवशी मी कांहीशा नाराजीने ताईला विचारलेला हा प्रश्न. पण ‘ते कोण?’ हे मला पुढे कांही वर्षांनी पुलाखालून बरंच पाणी वाहून गेल्यानंतर समजलं. अर्थात तेही माझ्या ताईमुळेच. तिच्या आयुष्यात आलेल्या, तिला उध्वस्त करू पहाणाऱ्या चक्रीवादळातही गजानन महाराजांवरील अतूट श्रद्धेमुळेच ती पाय घट्ट रोवून उभी राहिलीय हे मी स्वतः पाहिलं तेव्हा मला समजलं. पण त्यासाठी मला खूप मोठी किंमत मोजावी लागली होती! तिचं उध्वस्त होत जाणं हा खरं तर आम्हा सर्वांनाच खूप मोठा धक्का होता! या पडझडीत ते ‘आनंदाचं झाड’ पानगळ सुरू व्हावी तसं मलूल होत चाललं.. आणि ते फक्त दूर उभं राहून पहात रहाण्याखेरीज आम्ही काहीही करू शकत नव्हतो. नव्हे आम्ही जे करायला हवे होते ते ताईच आम्हाला करू देत नव्हती हेच खरं. तो सगळाच अनुभव अतिशय करूण, केविलवाणा होता आणि टोकाचा विरोधाभास वाटेल तुम्हाला पण तोच क्षणभर कां होईना एका अलौकिक अशा आनंदाचा साक्षात्कार घडवणाराही ठरणार होता !!

एखाद्या संकटाने चोर पावलांनी येऊन झडप घालणे म्हणजे काय याचा प्रत्यय आम्हा सर्वांना आला तो ताईला गर्भाशयाचा कॅन्सर डिटेक्ट झाला तेव्हा! या सगळ्याबाबत मी मात्र सुरूवातीचे कांही दिवस तरी अनभिज्ञच होतो. मला हे समजलं ते तिची ट्रीटमेंट सुरू होऊन पंधरा दिवस उलटून गेल्यानंतर. कारण मी तेव्हा विदर्भ मराठवाड्यातल्या ब्रॅंचेसचा ऑडिट प्रोग्रॅम पूर्ण करण्यांत व्यस्त आणि अर्थातच घरापासून खूप दूर होतो. तेव्हा मोबाईल नव्हते. त्यामुळे मला वेळ मिळेल तसं मीच तीन चार दिवसांतून एकदा रात्री उशीरा लाॅजपासून जवळच असलेल्या एखाद्या टेलिफोन बूथवरून घरी एसटीडी कॉल करायचा असं ठरलेलं होतं. कामातील व्यस्ततेमुळे मी त्या आठवड्यांत घरी फोन करायचं राहूनच गेलं होतं आणि शिळोप्याच्या गप्पा मारायच्या तयारीने नंतर भरपूर वेळ घेऊन मी उत्साहाने घरी फोन केला, तर आरतीकडून हे समजलं. ऐकून मी चरकलोच. मन ताईकडे ओढ घेत ‌राहिलं. ताईला तातडीनं भेटावंसं वाटत होतं पण भेटणं सोडाच तिच्याशी बोलूही शकत नव्हतो. कारण तिच्या घरी फोन नव्हता. ब्रँच ऑडिट संपायला पुढे चार दिवस लागले. या अस्वस्थतेमुळे त्या चारही रात्री माझ्या डोळ्याला डोळा नव्हता. आॅडिट पूर्ण झालं तशी मी लगोलग बॅग भरली. औरंगाबादहून आधी घरी न जाता थेट ताईला भेटण्यासाठी बेळगावला धाव घेतली. तिला समोर पाहिलं आणि.. अंहं… ‘डोळ्यात पाणी येऊन चालणार नाही. धीर न सोडता, आधी तिला सावरायला हवं.. ‘ मी स्वत:लाच बजावलं.

“कशी आहे आता तब्येत?”… सगळ्या भावना महत्प्रयासाने मनांत कोंडून टाकल्यावर बाहेर पडला तो हाच औपचारिक प्रश्न!

“बघ ना. छान आहे की नाही? सुधारतेय अरे आता.. “

ताईच्या चेहऱ्यावरचं उसनं हसू मला वेगळंच काहीतरी सांगत होतं! ती आतून ढासळणाऱ्या मलाच सावरू पहातेय हे मला जाणवत होतं.

केशवरावसुद्धा दाखवत नसले तरी खचलेलेच होते. त्यांच्या हालचालीतून, वागण्या बोलण्यातून, उतरलेल्या त्यांच्या चेहऱ्यावरून, बोलता बोलता भरून येतायत असं वाटणाऱ्या डोळ्यांवरून, त्यांचं हे आतून हलणं मला जाणवत होतं!

मी वयाने त्यांच्यापेक्षा खूप लहान. त्यांची समजूत तरी कशी आणि कोणत्या शब्दांत घालावी समजेचना.

“आपण तिला आत्ताच मुंबईला शिफ्ट करूया. तिथे योग्य आणि आवश्यक उपचार उपलब्ध असतील. ती सगळी व्यवस्था मी करतो. रजा घेऊन मी स्वत: तुमच्याबरोबर येतो. खर्चाची संपूर्ण जबाबदारी मी घेतो. तुम्ही खरंच अजिबात काळजी करू नका. ताई सुधारेल. सुधारायलाच हवी…. “

मी त्यांना आग्रहाने, अगदी मनापासून सांगत राहिलो. अगदी जीव तोडून. कारण थोडंसं जरी दुर्लक्ष झालं, उशीर झाला,.. आणि ताईची तब्येत बिघडली तर.. ? ती.. ती गेली तर?.. माझं मन पोखरू लागलेली मनातली ही भीती मला स्वस्थ बसू देईना.

केशवरावांनी सगळं शांतपणे ऐकून घेतलं. आणि मलाच धीर देत माझी समजूत घातली. बेळगावला अद्ययावत हॉस्पिटल आहे आणि तिथे सर्व उपचार उपलब्ध आहेत हे मला समजावून सांगितलं. त्यांनी नीट सगळी चौकशी केलेली होती आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे सर्वदृष्टीने विचार केला तर तेच अधिक सोयीचं होतं. मी त्यापुढं कांही बोलू शकलो नाही. ते सांगतायत त्यातही तथ्य आहे असं वाटलं, तरीही केवळ माझ्याच समाधानासाठी मी तिथल्या डॉक्टरांना आवर्जून भेटलो. त्यांच्याशी सविस्तर बोललो. माझं समाधान झालं तरी रूखरूख होतीच आणि ती रहाणारच होती!

केमोथेरपीच्या तीन ट्रीटमेंटस् नंतर ऑपरेशन करायचं कीं नाही हे ठरणार होतं. ती वाचेल असा डॉक्टरना विश्वास होता. तो विश्वास हाच आशेचा एकमेव किरण होता! केमोचे हे तीन डोस सर्वसाधारण एक एक महिन्याच्या अंतराने द्यायचे म्हणजे कमीत कमी तीन महिने तरी टांगती तलवार रहाणार होतीच आणि प्रत्येक डोसनंतरचे साईड इफेक्ट्स खूप त्रासदायक असत ते वेगळंच.

ताईचं समजल्यावर माझी आई तिच्याकडे रहायला गेली. त्या वयातही आपल्या मुलीचं हे जीवघेणं आजारपणही खंबीरपणे स्वीकारून माझी आई वरवर तरी शांत राहिली. घरातल्या सगळ्या कामांचा ताबा तिने स्वतःकडे घेतला. तिच्या मदतीला अजित-सुजित होतेच. औषधं, दवाखाना सगळं केशवराव मॅनेज करायचे. ताईचे मोठे दीर-जाऊ यांच्यापासून जवळच रहायचे. त्यांचाही हक्काचा असा भक्कम आधार होताच. हॉस्पिटलायझेशन वाढत राहिलं तेव्हा योग्य नियोजन आधीपासून करून तिथं दवाखान्यांत थांबायला जायचं, आणि एरवीही अधून मधून जाऊन भेटून यायचं असं माझ्या मोठ्या बहिणीने आणि आरतीने आपापसात ठरवून ठेवलेलं होतं. प्रत्येकांनी न सांगता आपापला वाटा असा उचलला होता‌. तरीही ‘पैसा आणि ऐश्वर्य सगळं जवळ असणाऱ्या माझं या परिस्थितीत एक भाऊ म्हणून नेमकं कर्तव्य कोणतं?’ हा प्रश्न मला त्रास देत रहायचा. जाणं, भेटणं, बोलणं.. हे सगळं सुरू होतंच पण त्याही पलिकडे कांही नको? सुदैवाने ताईच्या ट्रीटमेंटचा संपूर्ण खर्च करायची माझी परिस्थिती होती. मला कांहीच अडचण नव्हती. ‘हे आपणच करायला हवं’ असं मनोमन ठरवलं खरं पण आजवर माझ्यासाठी ज्यांनी बराच त्याग केलेला होता त्या माझ्या मोठ्या बहिणीला आणि भावाला विश्वासात न घेता परस्पर कांही करणं मलाच प्रशस्त वाटेना. मी त्या दोघांशी मोकळेपणानं बोललो. माझा विचार त्यांना सांगितला. ऐकून भाऊ थोडा अस्वस्थ झाला. त्याला कांहीतरी बोलायचं होतं. त्याने बहिणीकडं पाहिलं. मग तिनेच पुढाकार घेतला. माझी समजूत काढत म्हणाली, ” तिच्या आजारपणाचं समजलं तेव्हा तू खूप लांब होतास. तू म्हणतोयस तशी तयारी मी आणि हा आम्हा दोघांचीही आहेच. शिवाय मी आणि ‘हे’ सुद्धा खरंतर लगेचच पैसे घेऊन बेळगावला भेटायला गेलो होतो. केशवरावांना पैसे द्यायला लागलो, तर ते सरळ ‘नको’ म्हणाले. ‘सध्या जवळ राहू देत, लागतील तसे खर्च करता येतील’ असंही ‘हे’ म्हणाले त्यांना, पण त्यांनी ऐकलं नाही. “मला गरज पडेल तेव्हा मीच आपण होऊन तुमच्याकडून मागून घेईन’ असं म्हणाले. मला वाटतं, या सगळ्यानंतर आता तू पुन्हा त्यांच्याकडे पैशाचा विषय काढून लहान तोंडी मोठा घास घेऊ नकोस. जे करायचं ते आपण सगळे मिळून करूच, पण ते त्या कुणाला न दुखावता, त्यांच्या कलानंच करायला हवं हे लक्षा़त ठेव. ” ताई म्हणाली.

केशवराव महिन्यापूर्वीच रिटायर झाले होते. फंड आणि ग्रॅच्युइटी सगळं मिळून त्यांना साडेतीन लाख रुपये मिळालेले होते. अजित आत्ता कुठे सी. ए. ची तयारी करीत होता. सुजितचं ग्रॅज्युएशनही अजून पूर्ण व्हायचं होतं. एरवी खरं तर इथून पुढं ताईच्या संसारात खऱ्या अर्थाने स्वास्थ्य आणि विसावा सुरू व्हायचा, पण नेमक्या त्याच क्षणी साऱ्या सुखाच्या स्वागतालाच येऊन उभं राहिल्यासारखं ताईचं हे दुर्मुखलेलं आजारपण समोर आलं होतं.. !

“तुला.. आणखी एक सांगायचंय…. ” मला विचारांत पडलेलं पाहून माझी मोठी बहिण म्हणाली.

पण…. आहे त्या परिस्थितीत ती जे सांगेल ते फारसे उत्साहवर्धक नसणाराय असं एकीकडे वाटत होतं आणि ती जे सांगणार होती ते ऐकायला मी उतावीळही झालो होतो… !!

क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ गोठा… ☆ श्रीमती अनिता जयंत खाडीलकर ☆

श्रीमती अनिता जयंत खाडीलकर

? विविधा ?

 ☆ गोठा…  ☆ श्रीमती अनिता जयंत खाडीलकर ☆

गाईगुर, वासरं, म्हशीरेडक, शेळ्या यांनी भरलेला गोठा हे श्रीमंतीचं लक्षण समजले जातं. ती एक संपत्तीच होय. शेतकरी माणसाच्या घरी स्वतःचे बैल असणे हे ही एक श्रीमंतीचे लक्षण होय. आता जरी ट्रँक्टर आले असले तरीही किरकोळ कामाला बैलच उपयोगी पडतात. त्यांच्यावरच शेतकऱ्यांचा संसार, घरं उभी राहीलेली असतात. काही वेळा या शेतकऱ्यांच्या घरापेक्षा गोठाच मोठा असतो. मग त्यात पोटमाळाही असतो. खाली जनावरे आणि पोटमाळ्यावर गवत, पेंडीची पोती, तसेच धांन्याच्या कणग्या, एका बाजूला उन्हाळ्यात वाळवून ठेवलेल्या शेणी अस बरच काही ठेवता येते. मग त्यात गाईच्या शेणाच्या वेगळ्या व इतर जनावरांच्या शेणाच्या वेगळ्या करून ठेवल्या जातात. गाईच्या शेणाच्या शेणी देवक्रुत्यासाठी केल्या जाणाऱ्या होम, यज्ञ, याग यासाठी वापरल्या जातात. त्याचप्रमाणे गाईच्या शेणापासून तयार केलेल्या शेणींचा उपयोग करून त्यात कापूर, हळद, डिंक घालून दात घासायला वापरायची राखुंडीही तयार करण्यात येते. या शेणी सोवळ्याचा स्वयंपाक करतांना चुलीत जाळायला, बाळंतीण, बाळाला शेकशेगडीसाठी ही वापरतात.

आपल्या हिंदू धर्मात तर गाईला खूप महत्त्व आहे. तीला गोमाता म्हणतात. गाईगुरांच्या संगतीने वाढलेला आपला देव श्री क्रुष्ण तर सर्वांनाचाच आवडता देव आहे. त्याच्या मुरलीचे स्वर तर या गाईंना नेहमीच भान हरपायला लावत होते. आणि आपलेही भान या मुरलीच्या स्वरांनी हरपतेच.

लहानपणी लपाछपी खेळताना गोठा हेही एक लपण्याचे ठिकाण असे. गोठ्यात लपलेला खेळगडी लवकर सापडत नसे. तसेच बालपणी एखादा हट्ट मोठ्या माणसांनी पुरवला गेला नाही म्हणून गोठ्यात रुसून बसलेल्याच्याही अनेक गोष्टी सांगितल्या जातात. तसेच एखादी माहेरवाशीण आपला सासरी झालेला छळ आठवून आईवडिलांच्या नकळत आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिल्याच्याही अनेक कथा आपण ऐकत असतो. कधीतरी एखादा महत्त्वाचा निर्णयही या गोठ्यातच ठरवला जातो. तर काही वेळा तिथंच प्रेमाच हितगूज किंवा महत्त्वाची गोष्ट गुपचुप एखाद्याला सांगायला ही ह्याच गोठ्यात बोलावले जाते.

खूप ठिकाणी विशेषतः कोकणात एखादा माणूस मरण पावला की त्याच्या आकऱ्याव्या, बाराव्या, तेराव्या दिवसाचा स्वयंपाकही निशिद्ध मानला जात असल्याने व खूप ठिकाणी ह्यावेळी जेवणारे ब्राह्मण मिळत नाहीत. त्यामुळे तो स्वयंपाक या गोठ्यात करून तिथेच अशी पाने वाढून नंतर ती पाने वाढल्याचे शास्र करून मग ती पाने नदीत सोडून देण्याचीही प्रथा आहे.

हल्लीच्या दिवसात तर गाईगुरं नसलेल्या रिकाम्या गोठ्यात कोरांटिईन केलेल्या माणसांची सोय केली गेल्याच्या बातम्याही ऐकू येतात. तर असा हा गोठा खूप महत्त्वाचे ठिकाण आहे.

© श्रीमती अनिता जयंत खाडीलकर

सह्याद्री अपार्टमेंट, खाडीलकर गल्ली, बालगंधर्व नाट्यमंदिर समोर, ब्राह्मणपुरी, मिरज,जि. सांगली

मो 9689896341

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ रागावलेले प्राणी ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

सुश्री विभावरी कुलकर्णी

🔅 विविधा 🔅

☆ 🐱 रागावलेले प्राणी 🐜 ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

आज एक मुंगीची इमेज बघितली आपल्या गुगल बाबांची कृपा! आणि ती इमेज बघून एकदम घाबरलेच. आपली साधी घरात वावरणारी वेळेला आपल्या कपड्यांवर,अंगावर फिरणारी हीच ती मुंगी का? असा प्रश्न पडावा आणि भीती वाटावी असा तिचा चेहरा दिसत होता. एक विचार असा आला की देव मुंगी ( आपली गुदगुल्या करणारी काळी मुंगी ) आपल्याला चावत नाही. आपणच बरेचदा तिला त्रास देतो. म्हणूनच या लाल मुंग्यांना राग येत असावा आणि स्वत:ला मिळणारी वागणूक आणि काळ्या मुंगीला मिळणारी वागणूक हे दोन्ही मिळून ती एवढी रागीट चेहेऱ्याने आपल्याला कडकडून चावत असावी. 🐜

असेच सकाळी सकाळी म्हणजे साखर झोपेत असताना कोंबडा इतका कर्कश्श का ओरडत असावा? आमच्या शेजारच्या घरातील कोंबडा तर घड्याळाच्या दर तासाला नियमित पडणाऱ्या ठोक्या प्रमाणे दर तासाला आरवतो. बहुतेक दिवसभर त्याला माणसांच्या आवाजाचा जो त्रास होतो त्याचे उट्टे काढत असावा. 🐔

तीच गोष्ट कुत्र्यांची. कितीही लक्ष ठेवा आपला डोळा चुकवून आपण कंबर मोडून स्वच्छ  केलेल्या दरवाजावर व त्या समोरील स्वच्छतेवर घाण करून जाणार. अनेक उपाय केले पण कुत्र्यांना आमच्या घरा समोरची जागा फारच आवडली होती. जणू मला चिडवायचे ठरवूनच टाकले होते. मग मी गुगल साहेबांची मदत घेऊन उपाय शोधले आणि उग्र वासाच्या फिनाईलची मदत घेतली. त्याचा कुत्र्यांना एवढा राग आला की त्यांनी रात्रभर निरनिराळ्या आवाजात ( प्रत्येक कुत्र्याचा आवाज वेगळाच असतो म्हणा ) ओरडून माझ्या झोपेवर घाला घातला. असेही वाचनात आले होते की, लाल व निळ्या रंगाचे पाणी भरून बाटलीत ठेवले तर कुत्री, मांजरे यांचा त्रास होत नाही. मग मी पण तो उपाय केला. पण बाटल्या गायब होऊ लागल्या. शोध घेण्यासाठी खूप प्रयत्न केले. त्यावेळी त्यातील एक बाटली चक्क कुत्र्याच्याच तोंडात बघितली. आणि या रंगीत पाण्याच्या बाटल्या कोण पळवत आहे याचे उत्तर मिळाले.🐶

आमच्या काकांच्या घरी एक लाडाची मांजर होती. कोणी आणले नव्हते. तीच आपणहून आली होती. आणि बळेच सगळ्यांच्या पायात येऊन लाड करून घ्यायची. आम्ही कॅरम खेळायला बसल्यावर तिला खूप राग यायचा. ती त्या बोर्ड वर बराच वेळ बसायची. सोंगट्यांचे बराच वेळ निरीक्षण करायची आणि रागाने आपण स्वतःच सर्व सोंगट्या बिळात पंजाने ढकलून द्यायची. ती इतकी शहाणी होती की एखादा पदार्थ आवडला नाही तर पळून जायची. आणि जबरदस्तीने दिला तर जीभ बाहेर काढून उलटी आल्या सारखे करायची आणि तो पदार्थ देणाऱ्याला पंजाचा प्रसाद द्यायची. 🐱

अशीच एकदा आपण जिला गरीब समजतो अशा शेळीची गंमत कसली, रागच बघितला होता. एका शेळीला एक व्रात्य मुलगा शेपटीला हात लावून,ओढून सारखा त्रास देत होता. चार पाच वेळा ती पुढे पळाली. नंतर मात्र ती त्या मुलाकडे वळली आणि त्याला आपल्या छोट्या शिंगाने मारले. जणू तिने अन्यायाचा प्रतिकार करा हीच शिकवण दिली. 🦙

अशा काही थोड्या गमती,काही राग सहज ओरडणाऱ्या कोंबड्या मुळे आठवले. तशा प्राण्यांच्या बऱ्याच आठवणी,अनुभव व गमती जमती आहेत. त्या पुन्हा केव्हातरी.

© सुश्री विभावरी कुलकर्णी

मेडिटेशन,हिलिंग मास्टर व समुपदेशक, संगितोपचारक.

सांगवी, पुणे

📱 – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ रोखून धरलेली नजर… ☆ प्रा. भरत खैरकर☆

प्रा. भरत खैरकर

🌸 विविधा 🌸

रोखून धरलेली नजर ☆ प्रा. भरत खैरकर 

हे कधी लक्षात आलाय कां काही लोक नेहमी तुमच्या मर्यादा, कमतरता, सीमा दाखवायला, तपासायलाच बसलेले असतात! ते कधीही तुमच्याशी धड बोलत नाहीत. सारखा अपमान करण्याच्या स्थितीमध्ये किंवा तुम्हांला कमीपणा दाखवण्याच्या नादात असतात. तुम्हांला तुच्छ लेखण्यासाठी ते सतत खूप उत्सुक असतात.

त्यांच्या अशा वागण्याला आपण हसून देतो किंवा त्याकडे दुर्लक्ष करतो. पण अशाने ते थांबत नाहीत! अशावेळी काय करायचं? जे तुमचा सतत अनादर करतात. तुम्हांला हीन पद्धतीने वागवतात तर मग तुम्ही एक गोष्ट करा. अशा माणसाकडे एकदम डोळ्यात रोखून बघा! काही बोलूच नका!!

अशी माणसं तुम्हांला त्यांच्या नाटकामध्ये, तमाशामध्ये सामील करू इच्छितात. त्यासाठी तुमची प्रतिक्रिया, तुमचं घाबरलेपण, अळखळलेपणा, उत्तर देणं किंवा उलट उत्तर देणं त्यांना हवं असतं. जेणेकरून तुम्ही त्यात ओढले जाल. असं करून ते तुमचा आत्मविश्वास तोडू इच्छितात किंवा तुम्हांला हीन दाखवितात.

मात्र तुम्ही जेव्हा शांत राहून त्यांच्या नुसतं नजरेला नजर भिडवता तेव्हा मात्र त्यांचे सगळे पवित्रे फेल गेलेले असतात.. संपलेले असतात. आणि तुमच्या कोणत्याही प्रकारच्या न मिळालेल्या प्रतिसादामुळे सगळा खेळच उलटफेर होतो. कारण समोरच्या व्यक्तीला हवी असलेली प्रतिक्रिया आपण न केल्याने त्याचा ‘ पोपट’ होतो. आणि तो व्यक्ती आतल्याआत तडफडायला लागतो. ज्यावेळी तुम्ही स्थिर आणि रोखून अशी एक नजर टाकता. तेव्हा तुम्ही कुठलाही शब्द न वापरता स्पष्टपणे सांगत असतात की ‘तुझ्या नाटकात मी सामील होणार नाही!’. किंवा ‘तुला हवा आहे तसं मी वागणारच नाही’.. त्यामुळे समोरच्याचा भ्रमनिराश होतो.

ही अशी एक पद्धत आहे ज्यामुळे तुम्ही काहीही न करता समोरच्याला चितपट करू शकता. बऱ्याच वेळा स्थिर नजर आणि शांत राहणे ह्याच गोष्टी ‘कारीगर’ ठरतात.

हा उपाय रोजच्या आयुष्यात कसा उपयोगी पडतो हे बघायचे असेल तर हे ऐका.. मीटिंगमध्ये नेहमी एक व्यक्ती सारखी सारखी माझ्या मतावर प्रतिक्रिया द्यायची.. उलटसुलट रिएक्शन द्यायची. जसं काही त्याचं काहीतरी अडतयं किंवा त्याचा काहीतरी त्यात हेतू आहे.. स्वार्थ आहे.. त्याहीपेक्षा त्याला मला खालीच दाखवायचं होतं.. त्यासाठी तो चढ्या आवाजात बोलायचा.. आणि स्वतःलाच इतरांपेक्षा शहाणा समजायचा.. इतरांपेक्षा मलाच अक्कल आहे.. किंवा ‘मीच हे सर्व घडवून आणलं. ‘ हे दाखवण्याचा त्याचा नेहमी प्रयत्न असायचा.. त्यावेळी मी माझे म्हणणे अत्यंत नम्रपणे किंवा कोणालाही न दुखवता, इतरांचा आदर करत मांडायचो. तरीही त्याचा अट्टाहास काही जात नव्हता. ग्रामीण भाषेत ‘माझीच लाल’ असं बोलल्या जातं. तसा काहीसा तो व्यक्ती होता. त्यामुळे तो प्रत्येक वेळी मलाच नव्हे तर इतरांना सुद्धा मीटिंगमध्ये मधेमधे करून रोखून धरायचा.. व आपण किती हुशार आहोत हेच सांगायचा त्याचा रोख असायचा.. आता हे मात्र अती झालं होतं..

असेच एकदा मिटिंगमध्ये मी खुर्ची थोडीशी मागे केली.. रेलून बसलो.. आणि एकसारखा टक लावून त्याच्याकडे बघत गेलो.. मी शब्दही काढला नाही. माझे दोन्ही हात मी छातीशी बांधून घेतले आणि साधारण तीस-पस्तीस सेकंदापर्यंत त्या व्यक्तीला सारखा न्याहाळत राहिलो. नव्हे त्याला रोखूनच बघत राहिलो.. त्यामुळे हळूहळू मीटिंग मधील वातावरण एकदम ‘गरम’ झाले.. इतरही लोक मला फॉलो करू लागले.. तेही त्याच्याकडे टक लावून बघायला लागले.. कोणीच काही बोलत नव्हतं.. आणि आता सगळे त्याच्या रिॲक्शनची वाट बघत होते तो काय करतो किंवा काय करेल ही उत्सुकता सर्वांना लागली होती.

तो अचानक घाबरायला लागला.. त्याच्या आवाजाला कंप सुटला.. त्याचे शब्द अडखडायला लागले.. तो ततपप करायला लागला.. तो इकडे तिकडे बघायला लागला.. नजरेला नजर मिळवण्याची हिंमत करत नव्हता.. त्यानंतर झालेल्या कित्येक मीटिंगमध्ये त्याने मला मधे टोकलं नाही की रोखलं नाही. एवढंच नाही तर तिथून पुढे तो माझ्याशी इज्जतीत वागायला लागला.. आदर द्यायला लागला.. त्याला हे लक्षात आलं की मी तो व्यक्ती नाही ज्याला तो दाबू शकतो.. त्याच्या इशाऱ्यावर नाचवू शकतो.

बऱ्याच वेळा लोकांना हे दाखविण्यासाठी की तुम्ही नेमके कोण आहात हा पवित्र आजमावला पाहिजे!जेव्हा तुम्ही वरील पद्धत अवलंबता, तेव्हा समोरच्या व्यक्तीला तुम्ही सांगत असता की मी तुझ्या म्हणण्याप्रमाणे चालणारा व्यक्ती नाही. तुझ्या हातातली कठपुतली नाही. माझे धागेदोरे माझ्याच हातात आहे. ते तुला देऊन तुझ्या तमाशाचा मी भाग बनू इच्छित नाही. माझ्या भावभावनांशी खेळण्याचा तुला अधिकार मी देणारच नाही. आणि माझी मूल्ये काय आहे, हे तुझ्यासारख्या कडून सर्टिफाईड करून घेण्याची गरज नाही.

खूपदा आपला जेव्हा कोणी अपमान करतो किंवा बदनामी करतो तेव्हा आपण स्वतःला डिफेन्स करण्याचा पवित्रा आजमावतो.. आणि समोरच्या व्यक्तीला एक प्रकारे वाव देत असतो.. आपण आपली सफाई.. आपली बाजू मांडत असतो.. जेणेकरून कुठल्याही प्रकारची समस्या निर्माण होऊ नये किंवा भांडण होऊ नये. मात्र समोरचा त्या सगळ्या गोष्टींचं ‘पोतरं’ करतो.

अशावेळी तुम्ही रोखून धरलेली नजर ही काही आक्रमक कृती नाही. ती एक सौम्य पण रामबाण अशी कृती आहे! यामधून तुम्ही शांत आणि मजबुतीने उभे आहात खंबीर आहात हे समोरच्याला दिसतं.. तुमचे पाय जमिनीवर आहेत. तुम्ही उडो उडो करत नाही.. किंवा कुठलाही प्रकारचा दाखवेपणा तुम्हांला नको आहे. तुमचं काम आणि तुम्ही हे सांगण्याचा तुमचा रोख ह्यातून दिसतो. तुम्ही जिम्मेदार व्यक्ती आहात. हा सुद्धा संदेश या कृतीतून जातो.

जे लोक इतरांची बेईज्जत किंवा अपमान करत असतात त्यांना आजवर कोणीही रोखलेलं किंवा उलट बोललेलं नसतं. त्यामुळे हे लोक शेफारलेले असतात.

आपली उणीव झाकण्यासाठी असे लोक इतरांचा वापर करत असतात. त्यांना हे कोणी सांगितलं नसतं की तुमच्या अशा वागण्याने समोरच्याच व्यक्तिमत्व किंवा त्याचे सद्गुण दबून जातात.. पण जेव्हा तुम्ही अशा व्यक्तीला शांत आणि रोखून धरलेल्या नजरेने बघता तेव्हा ती कृती एका आरशासारखे काम करते.. तो आरसा.. ती नजर.. त्या व्यक्तीला त्याचं प्रतिबिंब दाखवितं. तुम्ही त्याला काही सांगत नसता फक्त त्याला ‘दाखवत’ असता.

पण विश्वास ठेवा की अशा प्रकारचे लोक या पद्धतीने स्वतःला कधीही बघू इच्छित नाही किंवा त्यांनी तसं स्वतःला कधी बघितलेच नसते.. स्वतःचं असं भयानक रूप जेव्हा ते त्या आरशात बघतात.. तेव्हा ते खजील होतात.. त्यांना त्यांच्या कृतीबद्दल शरम वाटते.. लाज वाटते. त्यामुळे रोखून पाहण्याची ही त-हा.. पद्धत खूप उपयुक्त आणि परिपूर्ण आहे. चला तर मग बघूया रोखून आपला अपमान करणाऱ्याकडे! ज्यामुळे समोरचा व्यक्ती थोडा माघारी जाईल आणि आपण आतल्या आत मजबूत होवू !!

© प्रा. भरत खैरकर

संपर्क – बी १/७, काकडे पार्क, तानाजी नगर, चिंचवड, पुणे ३३. मो.  ९८८१६१५३२९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “ऋतूनाम कुसुमाकरः…” ☆ सुश्री मानसी चिटणीस ☆

सुश्री मानसी विजय चिटणीस

? विविधा ?

☆ “ऋतूनाम कुसुमाकरः…” ☆ सुश्री मानसी विजय चिटणीस

वसंत हा निसर्गाचा उत्सव आहे. सतत सुन्दर भासणारा निसर्ग वसन्त ऋतूत सोळा कलांनी फुलून उठतो. यौवन हा जर आपल्या जीवनातील वसन्त असेल तर वसन्त हे सृष्टीचे यौवन आहे. महर्षी वाल्मीकींनी रामायणात वसन्त ऋतूचे अतिशय सुन्दर व मनोहारी चित्रण केले आहे. भगवान श्रीकृष्णानेही गीतेत ’ ऋतूनाम्‌ कुसुमाकरः’ असे म्हणून ऋतुराज वसन्ताची बिरुदावली गायली आहे. सतत आकर्षक वाटणारा निसर्ग वसन्त ऋतूमध्ये जणू पुन्हा रुजून येतो.

कात टाकणारे साप, धुळीची, किरणात नाचणारी बाळे, संध्याकाळी कौलांवर रेंगाळणारे कवडसे आणि खडकात फुलणारा चाफा हे सारे आजूबाजूला दिसू लागले की कळते आता बसंत आने को है.. अन् मन सावरीच्या कापसासारखं अलवार होऊन वाऱ्याच्या झुळकी होतं… या सगळ्या वसंताच्या आगमनाच्या सुचना आहेत हे वयपरत्वे कळत गेले…

फुलांचा संभार सांभाळत उभा असलेला चाफा बघणं मला आवडतं… असं वाटतं, रात्रीच्या वेळी त्याच्या फुलांमधून चांदण्यांचे झरे झिरपतात आणि मुरतात त्याच्या सालीमध्ये.. वाटतं जणू चाफा म्हणजे चांदण्यांचं घरच आहे की काय? तर कधी वाटतं, एखादी सोनपरी आपले इवले पंख पांघरून येईल कुठूनशी आणि चाफ्याच्या फुलावर मोठ्या डौलात बसून झोके घेत राहील… देवघरात झुल्यावर बसवलेल्या गोैरीसारखी…

खरंच हा वसंत एकटा येत नाही कधी. तो घेवून येतो नवीन पालवीची जादू… जी तो पखरत जातो कोमेजलेल्या फांद्यांपासून कोमेजलेल्या मनांपर्यंत… आणि उत्फुल्ल करून टाकतो सारा आसमंत… आपल्या पेटार्‍यातल्या रंगबिरंगी चिजा काढून रंगवून टाकतो सारा राखाडी बाज आपल्या रंगांच्या पंचमीत… चाफा, मोगरा, अमलताश, पलाश, बहावा सारेच त्याचे साथी आणि गुलमोहर तर प्राणप्रिय सखा-वाटायचं हा वसंत जसाकाही कान्हा आणि ही सृष्टी जणू राधिका; जी कान्हाच्या स्वागतासाठी सारी मरगळ झटकून साजशृंगार करते आहे. पाखरांच्या गळ्यातून तिच्या कान्हाजीचे स्वागत करते आहे, म्हणते आहे…

ऋतू वसंत तुम

अपनेही रंग सो

पी ढुंढन मै

निकसी घर सो

ऋतू बसंत तुम..

जणू काही कित्येक काळाच्या तितिक्षेनंतर विरहिणीला तिचा प्राणसखा भेटावा आणि तिने म्हणावे…

सजण दारी उभा… काय आता करू? घर कसे आवरू? मज कसे सावरू? हाच तो क्षण बहाव्यानं आपल्या सोनसळी फुलांनी सजण्याचा आणि पलाश, पांंगार आणि गुलमोहराने बहरण्याचा.

वसन्ताचा उत्सव हे अमर आशावादाचे प्रतीक आहे. वसन्ताचा खरा पुजारी जीवनात कधी निराश बनत नाही. शिशिर ऋतूत वृक्षाची पाने गळून पडतात, पण तो स्वतःच्या जीवनातून निराशा झटकून टाकतो. वसन्त म्हणजे आशा व सिद्धी ह्यांचा सुन्दर संगम. कल्पना व वास्तवता ह्यांचा सुगम समन्वय. जीवन व वसन्त ज्याने एकरूप करून टाकले अशा मानवाला आपली संस्कृती सन्त म्हणते. ज्याच्या जीवनात वसन्त फुलतो तो सन्त!

आकाश हेच घर असणाऱ्या तेजाने सगळीकडचा अंधार, उदासिनता दूर सारून प्रकाशानं आसमंत उजळून टाकावा आणि या तेजाचे काही कण पिऊन समस्त सृष्टीने नवा जन्म घ्यावा.. असंच काहीसं वाटतं वसंताच्या येण्यानं.. जणू फुलणाऱ्या प्रत्येक कळीतून नवीन जीवन जन्माला यावे आणि त्याने आपल्या रंग, गंध, रसातून उधळून द्यावे जीवनासक्तीचे तुषार जे शिशिराच्या वृद्ध उदास पानगळीलाही जगण्याचा मोह पाडतील.. हीच तर वसंताची जादू आहे.. वसंत म्हणजे सकारात्मकता. वसंत म्हणजे उत्साह. वसंत म्हणजे यौवन.. वसंत येतो, दवांत न्हातो. दर्वळ दर्वळ होतो. जणू एखाद्या लाजऱ्या पानसखीचे

मंथर गाणे गातो.. कधी फुलात हसतो, वनी लगडतो

झऱ्यांत झुळझुळ वाहतो.. तर कधी गंध कोवळा माखून घेऊन आभाळात पसरतो.. कधी वाऱ्यावर लहरत सूर सोहळा होतो तर कधी तृणांच्या मखमालीवर गवतफुलाबरोबर उमलताना सोनसावळा होऊन खुलतो.. एखाद्या आमराईत सहज वाऱ्याच्या हिंदोळ्यावर

आंबवती झुलताना कोकीळाच्या गळ्यातील पंचम तान होतो असा हा ऋतूनाम् कुसुमाकरः वसंत येतो अन् आपल्या ऋतूवैभवाने चिंब भिजवतो.. मला, तुम्हाला आणि साऱ्या चराचराला.. तेव्हा आठवतं

गगन सदन तेजोमय..

तेव्हा नक्कीच स्वागत करूया या ऋतूराजाचं जीवनातल्या नवीन बहरासाठी..

 © सुश्री मानसी विजय चिटणीस

केशवनगर, चिंचवड, पुणे. फोन : ०२०२७६१२५३१ / ९८८११३२४०७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ पालवी ते पानगळ… ☆ प्रा. सुनंदा पाटील ☆

प्रा. सुनंदा पाटील

? विविधा ?

☆ पालवी ते पानगळ… ☆ प्रा. सुनंदा पाटील ☆

श्रीराम जयराम जयजयराम……

श्रीराम जन्मोत्सवाच्या आणि नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !!

सध्या रामजन्मोत्सव होय रामजन्मोत्सवच, जयंती नव्हे, साजरा करताना अधिक आनंद होतोय. कारण प्रभू आपल्या मंदिरात विराजमान झाले आहेत. तसेच मंडळी मी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतेय. न्यू इयर साठी नाही. हॅपी न्यू इयर म्हणून हाय करणे ही संस्कृती आपली नव्हे. तर तो केवळ उपचार आहे. मोठ्यांना नमस्कार करून शुभेच्छा देणे आणि लहानांना आशीर्वाद देणे. वाकून मोठ्यांचा पदस्पर्श करणे यातही शास्त्र आहे. विज्ञान आहे. अशा तऱ्हेने शुभेच्छा दिल्या घेतल्या जातात. हा संस्कार आहे. संस्कृती आहे. यातही शास्त्र आहेच ना? गुढीपाडवा कसा साजरा करायचा वगैरे सर्व गोष्टी प्रत्येकाच्या घरातली वडील माणसं सांगतातच. पण खरंच चैत्र महिनाच वर्षाचा प्रथम महिना का ?

शिशिर ऋतूत झडलेली पानं आपण बघतो ! झाडांना चैत्रात नवी पालवी फुटायला लागते. मानवी जीवनातली निसर्गाने सांगितलेली ही फार मोठी गोष्ट आहे तत्वज्ञान आहे. यातच येतो गुढी पाडवा. श्री राम जन्मोत्सव, हनुमान जन्मोत्सव ! चैत्रगौर ! आंब्याची डाळ, पन्हं घेऊन !

दिवसा सूर्य अतिउच्च शिखरावरून टळटळू लागतो. पृथ्वीवरील पाणी, जेवढे शक्य असेल तेवढे वाफेच्या रूपात घेऊन जातो. तशातही टेम्भरे, करवंद, चारोळी, जांभूळ ही फळं निसर्गामध्ये देतच असतो. हा वर्षाचा प्रथम मास लवकर संपून न जावा असं वाटत असतानाच वैशाख येतो. कैरी जाते. तो आंबा घेऊन येतो. ऊन असतं पण फणस, आंबा, कोकम हवेहवेसे वाटतात ना? लगेच आगमन होतं जेष्ठाचं !

कडक ऊन. आणि मोसमी पूर्व थोडासा पाऊस. सृष्टी भाजून निघते. आणि पावसाची वाट बघणं सुरू होतं.

ढगांच्या गडगडासह, विजेच्या रोषनाईत नंतर आगमन होतं ते आषाढाचं. आर्द्रा नक्षत्र आपलं अक्राळ विक्राळ रूप दाखवू लागतं. पावसानं मस्त जोर धरलेला असतो. कारण हे सर्व पाणी जमिनीत मुरायला हवं असतं. झाडांना वर्षभर पुरायला हवं असतं. नदी नाले तलाव भरून ओसंडून वाहू लागतात. बळीराजा आनंदून जातो. लहानखुऱ्या पावसात त्याने पिकाची सुरुवात केलेली असते. आता यथेच्छ पाणी पिऊन पिकं मोठी होऊ लागतात.

माणसानंही असंच वागायला हवं. आपल्या योग्य वयात म्हणजे वयाची सोळा वर्ष पूर्ण करताच आपली ध्येये ठरवायला हवीत. पंधरा ते पंचेचाळीस हा खरा कालावधी शिक्षणाचा आणि हवं ते मिळविण्याचा. झपाटून अभ्यास, कष्ट करण्याचा. हे वय साध्य नव्हे तर, विद्यार्थी मित्रांनो साधन आहे. आषाढासारखं.

अतिपावसाचा कंटाळा आला असं म्हणावं लागू नये म्हणून की, काय लगेचच हिरव्या ऋतूचं आगमन होतं. अर्थातच श्रावणाचं. हिरवागार शालू नेसून एखादी नववधू विवाहासाठी तयार होऊन बसावी, तसा हा वर्षातला पाचवा महिना ! अधूनमधून पावसाची सर, मधेच पडणारं पिवळंधम्म उन्ह, आकाशाला तोरण बांधणारं इंद्रधनुष्य. सणांची रेलचेल !सर्वांना हवाहवासा वाटणारा श्रावणमास !

श्रावणातल्या धरणीचं लग्न लागलेलं असतं. तसं आषाढातच. भाद्रपदात झाडं, वेली वाढू लागतात. हळूहळू वेलींना फुलं येऊ लागतात. फळं लगडतात. सारा निसर्गच लेकुरवाळा होऊन जातो. ही लहान लहान लेकरं निसर्गाच्या अंगाखांद्यावर खेळू लागताच लगेच किंचितशी थंडीची चाहूल लागते.

खरंच की ! थंडीची चाहूल म्हणजेच आश्विनाची सुरुवात. अंगा खांद्यावर फिरणारी पिल्लं शाळेत जाऊ लागावीत. तरूण नवरा – बायकोने आपल्या सुखी संसाराची तजवीज करावी, असा वयाच्या तीस – पस्तीशीतला दृष्टीकोन ठेवणारा अश्विन महिना. पिकं डोलू लागतात. ती खराब होऊ नयेत म्हणून, शेतकरी आई होऊन काळजी घेऊ लागतो. पिकातली कीड काढून टाकून शेत निकोप कसं होईल याची काळजी घेतो. किती समजूतदार आहे नाही निसर्ग ?

माणसाची चाळीशी येते. संसार बऱ्यापैकी स्थिरावलेला असतो. मुलांना वाट दाखवायची असते. घरदार, जमापुंजी हळूहळू वाढायला लागते. अगदी असंच रूप धारण करुन कार्तिक महिना येतो. पस्तीशीतल्या जाणत्या देखण्या स्त्रीसारखा. आश्विन अमावसेला लक्ष्मीपूजन करून वेगवेगळे संकल्प करण्यासाठी येते ती बलिप्रतिपदा. हे व्यापऱ्यांचं नवीन वर्ष असतं बरं का?

नंतर हळूच आगमन होतं ते मार्गशीर्षाचं ! थंडीनं कळस गाठलेला असतो. तुम्ही आता स्थिरावलात. म्हणून सूर्य दाक्षिणेची काळजी घ्यायला दक्षिणायनात दाखल झालेला असतो. तब्येतीला आता जरासं जपायचं असतं. निसर्गही सारं जपू लागतो. धान्याच्या राशी घरात येतात. चार पैसे हातात खुळखुळू लागतात. गरज आणि सुखाची कल्पना संपून, मन चैनीकडे झुकावं, तसा हा वर्षातला ” शीर्ष महिना ” पुढल्या जन्मासाठी काही ठेव करून ठेवावी असं सांगणारा.

शेतकरी नाही का, पीक निघताच त्यातलं निखळ असं धान्य दुसऱ्या वर्षाच्या बीजाई साठी काढून ठेवतो ? अगदी तसाच. आमच्या वयाची साठीची अटकळ बांधणारा आणि सांधणारा हा मार्गशीर्ष सरता सरताच आगमन होतं ते पौषाचं.

पौषाचा पूर्वार्ध कडाक्याच्या थंडीचा. पण थोडंसं ऊन जाणवणारा. साठीच्या पुढल्या किंचितशा तब्येतीच्या कुरबुरी सुरु असाव्यात अगदी तसाच. तीळसंक्रांतीला तीळ गुळ, गाजर, बोरं, ऊस खाऊ घालणारा. सुखी असा !

आम्ही सत्तरीकडे झुकतो. तसा निसर्गात दाखल होतो माघ महिना. संपन्न पण जरासा काळजीचा. आमचीही मुलं आता संसारात रमणारी, मोठी झालेली असतात. आमच्या वानप्रस्थाच्या गोष्टी सुरु झालेल्या असतात. पण पैशाची ऊब आणि बऱ्यापैकी तब्येत एवढ्यातच वानप्रस्थ स्विकारू देत नाही. म्हणून कानटोपी घालून का होईना, आमचा मॉर्निंग वॉक सुरु असतोच. पण माणसाने तग धरायची तरी किती ? शेवटी शरीरच ते !

 कुणाच्या आयुष्याचा शिशिर माघातच सुरु होतो. गळू लागतात काही पानं ! हळूच आणि नकळत फाल्गुन आयुष्यात प्रवेशतो. होळीच्या रूपाने आयुष्यातली किल्मिषं, कटूपणा, वाईटपणा, जाळून टाकणारा हा महिना. यावेळी मला माझ्या तिसऱ्या वर्गातल्या कवितेचं एक कडवं आठवतं.

“उदासवाणा शिशिर ऋतू ये पाने पिवळी पडतात

सोसाट्याच्या वाऱ्यासंगे झरझर झरझर गळतात

झडून पाने झाडे सगळी केविलवाणी दिसतात

दिसे तयांच्या बुंध्यापाशी पिकल्या पानांची रास “

नवीन पालवीला जागा देण्यासाठी जुन्यांना गळावं लागतंच. शेवटी निसर्गच तो.

असा आमचा निसर्ग आणि हे बारा महिने / सहा ऋतू ! आयुष्यात खूप काही शिकवून जातात. कधी ते जीवन शिक्षण असतं ! कधी तत्वज्ञान । कधी रसग्रहण । तर कधी संगीत, ताल, लय, नृत्य । कधी रंग, कधी चित्रकला । भांडार आहे नुसतं ज्ञानाचं ! अगदी प्रतिपदा ते अमावस्या किंवा पौर्णिमा या पंधरा तिथ्यांना सुद्धा कुठलातरी सण आहे. पुढे कधीतरी तेही बोलूच.

पण आम्ही सध्या इकडेच पाठ फिरवतोय. दरवाजाच्या बाहेर पडून डोंगर /पर्वत कसे दिसतात ते आम्ही बघत नाही. म्हणून तर आमची मुलं आज रस्त्यावरच्या स्पीड ब्रेकरलाच पर्वत समजाहेत. निसर्गात शुद्ध हवा आहे हे एसीत जगणाऱ्यांना कळतच नाही. रेनकोट घालून पाऊस अनुभवता येत नाही आणि बूट घालून, हिरवे गालीचे समजत नाहीत. सिमेंटच्या छतातून चांदण्यांचं आकाश दिसत नाही.

तर असे हे चैत्रादी बारा महिने. यांचा इथे केवळ वरवर धांडोळा घेतलाय. या वर्षातला प्रत्येक दिवस आमचा गुरू आहे. काहीतरी शिकवणारा आहे, आणि याच गुरूला आम्ही आज पारखे झालो आहोत.

अर्थात याला कुणी खुळेपणाही म्हणतील. पण मंडळी स्वतःच्या आईला कुणी मावशी म्हणतं का? नाही ना ? असे आत्या, मामी, काकी, मावशी साऱ्यांचा आदरसत्कार जरूर करायला हवा. पण आपले महिने, आपलं वर्ष, आपल्या तिथ्या, संस्कृती, भाषा याचा आदर करायला आधी शिका ! कारण ती आपली आई आहे.

आता शिशिराचा शेवट आलाय. एखादं पान शंभरी पार करून नव्या पालवीसोबत दिसेलही. पण खरंच ही गळकी पानंही नव्यांना जागा करून देतात. स्वतः गळून पडतात. पण ती पिवळी पानंही आनंदाने गिरकी घेत घेत खाली येतात, तसंच माणसांनही रडत कुढत शेवट जवळ करण्यापेक्षा हसत करायला हवा. कारण हे निसर्गाचं चक्र आहे. नववर्ष आलंय.

” सहा ऋतूंचे चाक फिरतसे शिशिर ऋतूही जाईल हा

वसंत सांगे हळूच मीही येतो मागोमाग पहा “

वसंत ऋतू सुरू झालाय. त्याच्याच हातात हात घालून चैत्राचं आगमन झालंय. या चैत्रप्रतिपदेला ब्रह्मध्वजा उभारून ते साजरं करा. काही दृढ संकल्प करा. पुढल्या आश्विन, कार्तिक, मार्गशीर्षात आनंदोत्सव साजरे करायचे असतील, तर त्याची तजवीज आतापासूनच करा. कुणाला ” हॅपी न्यू इयर ” न म्हणता वर्षप्रतिपदेच्या शुभेच्छा द्या ! म्हणा – – – –

गुढीपाडवा : आनंद वाढवा इथून पुढे वर्षभर आपले सर्व सण आनंदाने साजरे करू या !

© प्रा.सुनंदा पाटील

गझलनंदा

८४२२०८९६६६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ महाराष्ट्रातील संत स्त्रिया – भाग – ३ – संत मदालसा किंवा महदंबा… ☆ सौ शालिनी जोशी ☆

सौ शालिनी जोशी

🔅 विविधा 🔅

☆ महाराष्ट्रातील संत स्त्रिया – भाग – ३ – संत मदालसा किंवा महदंबा☆ सौ शालिनी जोशी

संत मुक्ताबाई आणि संत जनाबाई यांच्या समकालीन संत महदंबा. यांचा काळ इसवी सन १२४२ ते इ.स.१३१२. या चक्रधर स्वामींच्या शिष्या  होत्या. यादवांच्या शेवटच्या काळातील मराठी संत चक्रधर आद्य – क्रांतिकारक, समाजसुधारक होते. सर्व धर्मातील व पंथातील महत्त्वाच्या गोष्टी निवडून त्यांनी महानुभाव पंथाची उभारणी केली. समानतेला महत्त्व दिले. त्यामुळे शूद्र व स्त्रिया आकर्षित झाले.मासिक धर्म,सोयरसुतक, अस्पृश्यता याला त्यांनी विरोध केला.  लोकभाषेत पंथाचा प्रसार केला.

महदंबा या औरंगाबाद जिल्ह्यातील वारसगाव येथील वायेनायके या दशग्रंथ ब्राह्मणाची मुलगी होत्या.वायेनायके हे प्रतिष्ठित व सुस्थितीतले होते. त्यांच्यामुळे महदंबा यांना परमार्थाची गोडी लागली. त्या प्रज्ञावंत विदूषी झाल्या. एका वादात परप्रांती विद्वानाना जिंकून त्यांनी  जैतपत्र मिळवले. तेव्हा राजाने त्याना पाच गावे इमान दिली होती. महदंबा बालविधवा असल्याने  माहेरीच राहत असत. प्रथम वडिलांच्या संमतीने त्यानी दारूस नावाच्या एका साधू पुरुषाचे शिष्यत्व पत्करले. त्यामुळे धर्माचे संस्कार अधिक बळकट झाले. संत चक्रधर हे दारूचे गुरु. त्यामुळे महदंबांची व चक्रधर स्वामी यांची ओळख झाली.

संत चक्रधरांचे विचार महदंबाना पटले. त्या अभ्यासू व बुद्धिमान होत्या. त्या काळात स्त्रियांची स्थिती पशुपेक्षा केविलवाणी, त्यात विधवेचे जीवन म्हणजे शापच. पण महानुभाव पंथातील स्त्रियांना मिळणारी माणूसपणाची वागणूक आणि पुरुषांच्या बरोबरीचे स्थान यांनी महादंबेचे मन जिंकले. त्यांनी चक्रधरांकडे घेऊन वडिलांच्या मनाविरुद्ध संन्यास घेतला. सर्व संत स्त्रियात संन्याशी या एकट्याच होत्या. हिंदू धर्मातील गोत्र,जात, कुल यांना तिलांजली देऊन हिंदू विरोधी मानला गेलेल्या पंथात त्या सामील झाल्या. वैराग्य आणि मनोनिग्रह यांच्या जोरावर वेगळी वाट यशस्वीपणे चोखाळली. पंथातील अनेक स्त्रियांना साधले नाही ते करून दाखवले. पंथाचे कडक आचारधर्म, मठाचे नियम, शिस्त, भिक्षा धर्म हे सगळं त्यानी स्वीकारलं. संन्यास वेश त्यांनी धारण केला. चक्रधर स्वामींच्या पट्ट्य शिष्या झाल्या.त्या आद्य कवियत्री ठरल्या.

लग्नप्रसंगी म्हणावयाची रसाळ अशी गाणी त्यांनी रचली. त्याला धवळे किंवा धवळगीत म्हणतात.

‘कासे पितांबर l कंठी कुंदमाळा l कांतु शोभे सावळा l रुक्मिणीचा l’

अशा या रचना. त्यानी रुक्मिणी स्वयंवराची रचना केली. त्यांच्यासाठी गुरु आणि  देव कृष्ण एकरूप झालेले. दोघांचा उल्लेख त्यांच्या काव्यात येतो. अशा प्रकारे भक्तीने  ओथंबलेल्या पण  भाबडी अनुचर नव्हत्या . तर विचारी, जिज्ञासू आणि करारी होत्या .पंथाची धुरा वाहण्यास समर्थ होत्या.लीलाचरित्र हा महानुभावांचा श्रेष्ठ ग्रंथ. महदंबांच्या प्रश्नांना उत्तरे देता देताच या ग्रंथाचा बराचसा भाग तयार झाला. ७० व्या वर्षी गुरुस्मरणात त्यांनी देह सोडला.

चित्र साभार : संत महदंबा यांची संपूर्ण माहिती मराठी – sant sahitya – charitra mahiti abhang gatha granth rachana –

©  सौ. शालिनी जोशी

संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया  टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.

मोबाईल नं.—9850909383

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “सिक्रेट ऑफ हॅपिनेस…” ☆ श्री सुधीर करंदीकर ☆

श्री सुधीर करंदीकर

🔆 विविधा 🔆

☆ “सिक्रेट ऑफ हॅपिनेस” ☆ श्री सुधीर करंदीकर ☆

असं म्हणतात, “There is only one Happiness in this life, to love and be loved. Love is the master key that opens the gates of happiness.”

आणि या करता जरुरी आहे – स्वतः वर प्रेम करण्यापासून सुरुवात करण्याची. स्वतः वर प्रेम करणारी व्यक्तीच सभोवतालावर प्रेम करू शकते आणि आनंद निर्माण करू शकते. Love yourself first, and everything else falls into line.

* * * *

आजच्या जगात सगळं काही मिळतं, पण आनंद मिळत नाही, असं म्हणतात. कारण आनंद हा कुठल्याही भौतिक वस्तुपासून मिळवता येत नसतो, तर तो माणसांपासूनच मिळवावा लागतो.

आपल्या आसपास माणसं खूप असतात, पण म्हणावं असं किंवा जवळचं असं, आपलं कुणीच नसतं. आणि हीच जवळ जवळ सगळ्यांचीच खंत असते. जवळची माणसं का नाहीत ? तर खरं प्रेम किंवा मनापासून प्रेम हे कुणी कुणावर करतच नाही किंवा असे प्रेम करणारे फारच थोडे थोडके असतात.

नवरा बायको राहतात एका घरात, पण relations dry असतात. आई वडील – मुलं /सुना – नातवंडं राहतात एका घरात, पण relations dry असतात. शेजारी – पाजारी राहतात आसपास, पण relations dry असतात.

ह्या सगळ्यांना जवळ करण्याकरता जरुरी असते, मनापासूनचे प्रेम किंवा सच्चे दिलसे प्यार किंवा इनर लव्ह यांची.

देव आपल्या सगळ्यांना इथे पाठवतांना आपल्या मनावर प्रेमाचे कपडे घालूनच पाठवत असतो. आणि तेच प्रेमाचे कपडे आपण सगळ्यांनीच आयुष्यभर आपल्या मनावर ठेवावे आणि मिळालेलं आयुष्य आनंदात घालवावं, अशी त्याची मनापासून इच्छा असते आणि त्याचे तसे आशीर्वाद पण आपल्यामागे असतात. लहान असतांना आपल्या मनावर तेच कपडे असतात, त्यामुळे सगळ्यांचेच बालपण आनंदानी भरलेलं असतं.

आपण सगळेच थोडे मोठे झालो, कि आपल्यामधला “मी” जागा होतो. हे माझे / ते माझे आणि थोडक्यात म्हणजे सगळेच आपल्यामधल्या त्या “मी” ला पाहिजे असते. आणि मग ते मिळवण्याकरता निरनिराळे मार्ग शोधणे सुरु होते, धावपळ सुरु होते. मोह – माया – मत्सर – राग – लोभ – द्वेष हे आपले मित्र बनतात. आणि इथेच आपल्या आयुष्याचे सगळे गणितच बदलते. देवानी दिलेल्या प्रेमाच्या कपड्यांवर आपण “मी” चे कपडे चढवतो. आणि देवानी दिलेले प्रेमाचे कपडे दफन होतात. बऱ्याच वेळा खोटं किंवा नाटकी प्रेम यांना पण आपण जवळ करतो. प्रेमामधे खरं प्रेम आणि खोटं प्रेम किंवा नाटकी प्रेम असे दोन प्रकार असतात.

खरं प्रेम बघायला मिळतं, प्रेमी / प्रेमिका यांच्यामधे.

खरं प्रेम बघायला मिळतं, शाळा / कॉलेज चे मित्र – मैत्रिणी यांच्यामधे.

खरं प्रेम बघायला मिळतं, मुलं लहान असेपर्यंत आई / वडील आणि मुलं यांच्यामधे.

खरं प्रेम बघायला मिळतं, बहीण – भावंडांमध्ये ते शाळा – कॉलेज मध्ये शिकत आहेत तोपर्यंत किंवा त्यांची लग्ने होईपर्यंत.

लग्न झाल्यानंतर नवरा आणि बायको यांच्यामधे प्रेम असते, पण conditions apply असे लेबल त्याला लागते. आपल्या बायकोनी काय करावं / कसं वागावं, वगैरे अशी अपेक्षांची यादी नवरेमंडळीची तयार असते. शिकलेल्या आणि नोकरी करणाऱ्या मुलींना हे पसंत पडत नाही आणि पडू पण नये. आपल्या नवऱ्यानी कसे वागावे / काय करावे अशा याद्या बायकोच्या पण तयार असतात. अशा अपेक्षांची आमने- सामने बहुतेक घरांमध्ये होते. आणि मग दोघांमधे नाराजी / बेबनाव / चिडचिड अशी यादी सुरु होते आणि अशा फॅमिली लाईफला आपण संसाराचा गाडा ओढणे असे म्हणतो. आपल्या आधीच्या पिढीमध्ये मुली शिकलेल्या नसायच्या आणि पती परमेश्वर हि संकल्पना त्यांच्या मनात वडीलधाऱ्यांनी रुजवलेली असायची, त्यामुळे आपले मन मारून नवऱ्यांच्या अपेक्षांप्रमाणे बायका वागायच्या आणि संसाराचा गाडा तसा पुढे जात राहायचा.

“जो तुमको हो पसंद, वही बात कहेंगे, तुम दिन को अगर रात कहो, रात कहेंगे “, असा विचार करणारे पण नवरा-बायको असतात. “प्यार मे अपना कब्जा दिया जाता है, ना कि दुसरेका कब्जा लिया जाता है”, अशी विचारसरणी असणारे पण नवरा-बायको असतात आणि आहेत. त्यांच्यामधल्या प्रेमाला conditions apply असे लेबल नसते, हे सरळच आहे.

लग्न झाल्यानंतरची मुलं आणि त्यांचे आई वडील / लग्न झालेले भाऊभाऊ / लग्न झालेले भाऊबहीण / लग्न झालेल्या बहिणी यांच्यामधे प्रेम असते, पण conditions apply असे लेबल इथे पण लागलेले असते. आईवडिलांची जबाबदारी पडणे, त्यांची उपयुक्तता संपणे, आई वडिलांच्या संपत्तीचे वाटप, अशा घटना या नात्यांमध्ये वरवर दिसणाऱ्या प्रेमाचा कमकुवतपणा उजेडात आणतात आणि प्रेमामधल्या conditions apply चा अर्थ पण उघड होतो.

राधा कृष्ण, कृष्ण द्रौपदी, श्रावणबाळ, राम लक्ष्मण भरत, अशी उदाहरणे आज पण बघायला मिळतातच, पण खूप थोडी थोडकी. खरं प्रेम म्हणजे Unconditional Love. खरं प्रेम म्हणजे No Expectations. खरं प्रेम म्हणजे It Is Only Giving and Giving.

​ढाई अक्षर ‘प्रेम’ के, सारा जग जितवाये I

ढाई अक्षर ‘प्यार’ के, सबको पास खिचवाये I

ढाई अक्षर ‘लव्ह’ के, सब को गले मिलवाये I

आणि ही “ ढाई अक्षरं ” ज्यांना आचरणात उतरवता येतात,

त्यांच्याकरता see the after effect – – –

© श्री सुधीर करंदीकर

मो. 9225631100 – ईमेल – srkarandikar@gmail. com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग ५० ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग ५० ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र- माझ्या आयुष्यांत त्या त्या क्षणी मला अतीव दुःख देऊन गेलेल्या, माझे बाबा आणि समीर यांच्या अतिशय क्लेशकारक मृत्यूंशीच निगडित असणाऱ्या या सगळ्याच पुढील काळांत घडलेल्या घटना माझं उर्वरित जगणं शांत, समाधानी आणि अर्थपूर्ण करणारे ठरलेल्या आहेत. ‘त्या’चा कृपालोभ यापेक्षा वेगळा तो काय असणार?

हे सगळं त्या त्या क्षणी पूर्ण समाधान देणारं वाटलं तरी तो पूर्णविराम नव्हता. पुढील आयुष्यांत असे अनेक कसोटी पहाणारे क्षण माझी वाट पहात आहेत याची मला कल्पना नव्हती एवढंच!)

तीस वर्षांपूर्वीची ही एक घटना त्यापैकीच एक. आजही ती नुकतीच घडून गेलीय असंच वाटतंय मला. कारण ती घटना अतिशय खोलवर ठसे उमटवणारीच होती!

ही घटना आहे माझ्या दोन नंबरच्या बहिणीच्या संदर्भातली. जशी तिची कसोटी पहाणारी तशीच सासर आणि माहेर अशा दोन्हीकडच्या तिच्या कुटुंबियांचीही!

दोन मोठ्या बहिणींच्या पाठचे आम्ही तिघे भाऊ. या दोघींपैकी दोन नंबरच्या बहिणीची ही गोष्ट. ती माझ्यापेक्षा चार वर्षांनी मोठी. पण मला ती तशी कधी वाटायचीच नाही. ताईपणाचा, मोठेपणाचा आब आणि धाक तसाही माझ्या या दोन्ही बहिणींच्या स्वभावात नव्हताच. तरीही या बहिणीचा विशेष हा कीं आमच्याबरोबर खेळताना ती आमच्याच वयाची होऊन जात असे. त्यामुळे ती मला माझी ‘ताई’ कधी वाटायचीच नाही. माझ्या बरोबरीची मैत्रिणच वाटायची. तिने आम्हा तिघा भावांचे खूप लाड केले. माझ्यावर तर तिचा विशेष लोभ असे. म्हणूनच कदाचित माझ्या त्या अजाण, अल्लड वयात मी केलेल्या सगळ्या खोड्याही ती न चिडता, संतापता सहन करायची. जेव्हा अती व्हायचं, तेव्हा आईच मधे पडायची. मला रागवायची. पण तेव्हा आईने माझ्यावर हात उगारला की ही ताईच मला पाठीशी घालत आईच्या तावडीतून माझी सुटका करायची. “राहू दे.. मारु नकोस गं त्याला.. ” म्हणत मला आईपासून दूर खेचायची न् ‘जाs.. पळ.. ‘ म्हणत बाहेर पिटाळायची.

मोठ्या बहिणीच्या पाठोपाठ हिचंही लग्न झालं, तेव्हा मी नुकतंच काॅलेज जॉईन केलं होतं. ती सासरी गेली तेव्हा आपलं हक्काचं, जीवाभावाचं, हवंहवंसं कांहीतरी आपण हरवून बसलोय असंच मला वाटायचं आणि मन उदास व्हायचं!

तुटपुंज्या उत्पन्नातलं काटकसर आणि ओढाताण यात मुरलेलं आमचं बालपण. ओढाताण आणि काटकसर ताईच्या सासरीही थोड्या प्रमाणात कां होईना होतीच. पण तिला ते नवीन नव्हतं. मुख्य म्हणजे तिने ते मनापासून स्वीकारलेलं होतं. ती मुळातच अतिशय शांत स्वभावाची आणि सोशिक होती. केशवराव, माझे मेव्हणे, हे सुद्धा मनानं उमदे आणि समजूतदार होते. अजित आणि सुजितसारखी दोन गोड मुलं. कधीही पहावं, ते घर आनंदानं भरलेलंच असायचं. असं असूनही तिच्या बाबतीत मी खूप पझेसिव्ह असल्यामुळेच असेल तिच्यातली मैत्रीण तिच्या लग्नानंतर मला त्या रूपात पुन्हा आता कधीच भेटणार नाही असं आपलं उगीचच वाटत राहिलेलं. ती अनेक वाटेकर्‍यांत वाटली गेली आहे असंच मला वाटायचं. केशवराव, अजित, सुजित हे तिघेही खरंतर प्राधान्य क्रमानुसार हक्काचेच वाटेकरी. त्याबद्दल तक्रार कसली? पण माझ्या मनाला मात्र ते पटत नसे. तिचा सर्वात जास्त वाटा त्यांनाच मिळतोय अशा चमत्कारिक भावनेने मन उदास असायचं आणि मग व्यक्त न करता येणारी अस्वस्थता मनात भरून रहायची.

ताईचं मॅट्रिकनंतर लगेच लग्न झालं न् तिचं शिक्षण तिथंच थांबलं. लग्नानंतर तिनेही त्या दिशेने पुढे कांही केल्याचं माझ्या ऐकिवात तरी नव्हतंच. केशवराव आर. एम. एस. मधे साॅर्टर होते. आठवड्यातले किमान चार दिवस तरी ते बेळगाव-पुणे रेल्वेच्या पोस्टाच्या टपाल डब्यांतल्या साॅर्टींगसाठी फिरतीवर असायचे. बिऱ्हाड अर्थातच बेळगावला.

मी मोठा झालो. स्वतःच्या पायावर उभा राहिलो. माझं लग्न होऊन माझा संसार सुरू झाला. ती जबाबदारी पेलताना मनात मात्र सतत विचार असायचा तो ताईचाच. केशवरावांच्या एकट्याच्या पगारांत चार माणसांचा संसार वाढत्या महागाईत ताई कसा निभावत असेल या विचाराने घरातला गोड घासही माझ्या घशात उतरत नसे. आम्ही इतर भावंडं परिस्थितीशी झुंजत यश आणि ऐश्वर्याच्या एक एक पायऱ्या वर चढून जात असताना ताई मात्र अजून पहिल्याच पायरीवर ताटकळत उभी आहे अशी एक विचित्र भावना मनात येऊन मला वाईट वाटायचं.

मनातली ती नाराजी मग घरी कधी विषय निघाला की नकळत का होईना बाहेर पडायचीच. पण ती कुणीच समजून घ्यायचं नाही.

“हे बघ, प्रत्येकजण आपापला संसार आपापल्या पद्धतीनेच करणार ना? त्याबद्दल ती कधी बोलते कां कांही? कुणाकडे काही मागते कां? नाही ना? छान आनंदात आहे ती. तू उगीच खंतावतोयस ” आई म्हणायची.

“ताई सतत हे नाही ते नाही असं रडगाणं गात बसणाऱ्या नाहीत” असं म्हणत आरतीही तिचं कौतुकच करायची. “त्या समाधानानंच नाही तर स्वाभिमानानंही जगतायत ” असं ती म्हणायची.

मला मनोमन ते पटायचं पण त्याचाच मला त्रासही व्हायचा. कारण ताईचा ‘स्वाभिमान’ मला कधी कधी अगदी टोकाचा वाटायचा. ती स्वतःहून कुणाकडेच कधीच कांही मागायची नाही. व्यवस्थित नियोजन करून जमेल तशी एक एक वस्तू घेऊन ती तिचा संसार मनासारखा सजवत राहिली. हौसमौजही केली पण जाणीवपूर्वक स्वत:ची चौकट आखून घेऊन त्या मर्यादेतच! इतर सगळ्यांना हे कौतुकास्पद वाटायचं, पण मला मात्र व्यक्त करता न येणारं असं कांहीतरी खटकत रहायचंच. कारण स्वतःहून कधीच कुणाकडे कांही मागितलं नाही तरीही कुणी कारणपरत्वे प्रेमानं कांही दिलं तर ते नाकारायची नाही तसंच स्वीकारायचीही नाही. दिलेलं सगळं हसतमुखाने घ्यायची, कौतुक करायची आणि त्यांत कणभर कां होईना भर घालून अशा पद्धतीने परत करायची की तिने ते परत केलंय हे देणाऱ्याच्या खूप उशीरा लक्षात यायचं. अगदी आम्ही भाऊ दरवर्षी तिला घालत असलेली भाऊबीजही याला अपवाद नसायची!

‘दुसऱ्याला ओझं वाटावं असं देणाऱ्यानं द्यावं कशाला?’ असं म्हणत आरती तिचीच बाजू घ्यायची, आणि ‘हा स्वभाव असतो ज्याचा त्याचा. आपण तो समजून घ्यावा आणि त्याचा मान राखावा’ असं म्हणून आई ताईचंच समर्थन करायची.

त्या दोघींनी माझ्या ताईला छान समजून घेतलेलं होतं. मला मात्र हे जेव्हा हळूहळू समजत गेलं, तसं माझ्या गरीब वाटणाऱ्या ताईच्या घरच्या श्रीमंतीचं मला खरंच खूप अप्रूप वाटू लागलं. माझ्याकडे अमुक एक गोष्ट नाही असं माझ्या ताईच्या तोंडून कधीच ऐकायला मिळायचं नाही. सगळं कांही असूनसुद्धा कांहीतरी नसल्याची खंत अगदी भरलेल्या घरांमधेही अस्तित्वात असलेली अनेक घरं जेव्हा आजूबाजूला माझ्या पहाण्यात येत गेली तसं माझ्या ताईचं घर मला खूप वेगळं वाटू लागलं. लौकिकदृष्ट्या कुणाच्या नजरेत भरावं असं तिथं कांही नसूनसुद्धा सगळं कांही उदंड असल्याचा भाव ताईच्याच नव्हे तर त्या घरातल्या सर्वांच्याच चेहऱ्यावर मला नव्याने लख्ख जाणवू लागला आणि माझ्या ताईचं ते घर मला घर नव्हे तर ‘आनंदाचं झाड’ च वाटू लागलं! त्या झाडाच्या सावलीत क्षणभर कां होईना विसावण्यासाठी माझं मन तिकडं ओढ घेऊ लागलं. पण मुद्दाम सवड काढून तिकडं जावं अशी इच्छा मनात असूनही तेवढी उसंत मात्र मला मिळत नव्हतीच.

पण म्हणूनच दरवर्षी भाऊबीजेला मात्र मी आवर्जून बेळगावला जायचोच. कोल्हापूरला मोठ्या बहिणीकडे आदल्या दिवशी रात्री मुक्कामाला. तिथे पहाटेची अंघोळ आणि फराळ करुन, दुपारचं जेवण बेळगावला ताईकडं, हे ठरूनच गेलं होतं. जेवणानंतर ओवाळून झालं की मला लगेच परतावं लागायचं. पण मनात रूखरूख नसायची. कारण माझ्या धावत्या भेटीतल्या त्या आनंदाच्या झाडाच्या सावलीतली क्षणभर विश्रांतीही मला पुढे खूप दिवस पुरून उरेल एवढी ऊर्जा देत असे.

बेंगलोरजवळच्या बनारगट्टाला आमच्या बँकेचं स्टाफ ट्रेनिंग सेंटर आहे. एक दोन वर्षातून एकदा तरी मला दोन-तीन आठवड्यांच्या वेगवेगळ्या ट्रेनिंग प्रोग्रॅम्ससाठी तिथे जायची संधी मिळायची. एकदा असंच सोमवारपासून माझा दहा दिवसांचा ट्रेनिंग प्रोग्रॅम सुरू होणार होता. कोल्हापूरहून रविवारी रात्री निघूनही मी सोमवारी सकाळी बेंगलोरला सहज पोचू शकलो असतो, पण ताईला सरप्राईज द्यावं असा विचार मनात आला आणि रविवारी पहाटेच मी बेळगावला जाण्यासाठी कोल्हापूर सोडलं. तिथून रात्री बसने पुढं जायचं असं ठरवलं. सकाळी दहाच्या सुमारास बेळगावला गेलो. ताईच्या घराच्या दारांत उभा राहिलो. दार उघडंच होतं. पण मी हाक मारली तरी कुणाचीच चाहूल लागली नाही. केशवराव ड्युटीवर आणि मुलं बहुतेक खेळायला गेलेली असणार असं वाटलं पण मग ताई? तिचं काय?.. मी आत जाऊन बॅग ठेवली. शूज काढले. स्वैपाकघरांत डोकावून पाहिलं तर तिथे छोट्याशा देवघरासमोर ताई पोथी वाचत बसली होती. खुणेनेच मला ‘बैस’ म्हणाली. मी तिच्या घरी असा अनपेक्षित

आल्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर पुसटसा दिसला खरा, पण मी हातपाय धुवून आलो तरी ती आपली अजून तिथंच पोथी वाचत बसलेलीच. मला तिचा थोडा रागच आला.

“किती वेळ चालणार आहे गं तुझं पोथीवाचन अजून?” मी त्याच तिरीमिरीत तिला विचारलं आणि बाहेर येऊन धुमसत बसून राहिलो. पाच एक मिनिटांत अतिशय प्रसन्नपणे हसत ताई हातात तांब्याभांडं घेऊन बाहेर आली.

“अचानक कसा रे एकदम? आधी कळवायचंस तरी.. ” पाण्याचं भांडं माझ्यापुढे धरत ती म्हणाली.

“तुला सरप्राईज द्यावं म्हणून न कळवता आलोय. पण तुला काय त्याचं? तुझं आपलं पोथीपुराण सुरूच. “

“ते थोडाच वेळ, पण रोज असतंच. आणि तसंही, मला कुठं माहित होतं तू येणारायस ते? कळवलं असतंस तर आधीच सगळं आवरून तुझी वाट पहात बसले असते. चल आता आत. चहा करते आधी तोवर खाऊन घे थोडं. “

माझा राग कुठल्या कुठे निघून गेला. मी तिच्यापाठोपाठ आत गेलो. भिंतीलगत पाट ठेवून ती ‘बैस’ म्हणाली आणि तिने स्टोव्ह पेटवायला घेतला.

“कुठली पोथी वाचतेय गं?” मी आपलं विचारायचं म्हणून विचारलं. कारण दत्तसेवेचं वातावरण असलेल्या माहेरी लहानाची मोठी झालेली ताई दत्त महाराजांचं महात्म्य सांगणारंच कांहीतरी वाचत असणार हे गृहीत असूनही मी उत्सुकतेपोटी विचारलं.

“आई बोलली असेलच की़ कधीतरी. माहित नसल्यासारखं काय विचारतोस रे? ” ती हसून म्हणाली.

“खरंच माहित नाही. सांग ना, कसली पोथी?”

“गजानन महाराजांची. “

मला आश्चर्यच वाटलं. कारण तेव्हा गजानन महाराजांचं नाव मला फक्त ओझरतं ऐकूनच माहिती होतं. ‘दत्तसेवा सोडून हिचं हे कांहीतरी भलतंच काय.. ?’ हाच विचार तेव्हा मनात आला.

“कोण गं हे गजानन महाराज?” मी तीक्ष्ण स्वरांत विचारलं. माझ्या आवाजाची धार तिलाही जाणवली असावी.

“कोण काय रे?” ती नाराजीने म्हणाली.

“कोण म्हणजे कुठले?कुणाचे अवतार आहेत ते?”

माझ्याही नकळत मला तिचं ते सगळं विचित्रच वाटलं होतं. तिला मात्र मी अधिकारवाणीने तिची उलट तपासणी घेतोय असंच वाटलं असणार. पण चिडणं, तोडून बोलणं तिच्या स्वभावातच नव्हतं. तिने कांहीशा नाराजीने माझ्याकडे रोखून पाहिलं, आणि शक्य तितक्या सौम्य स्वरांत म्हणाली, ” तू स्वतःच एकदा मुद्दाम वेळ काढून ही पोथी वाच. तरच तुला सगळं छान समजेल. ” आणि मग तिनं तो विषयच बदलला.

ही घटना म्हणजे दत्तसेवेबद्दलची नकळत माझ्या मनावर चढू पहाणारी सूक्ष्मशा अहंकाराची पुटं खरवडून काढण्याची सुरुवात होती हे त्याक्षणी मला जाणवलं नव्हतंच. पण आम्हा सगळ्यांचंच भावविश्व उध्वस्त करणाऱ्या पुढच्या सगळ्या घटनाक्रमांची पाळंमुळं माझ्या ताईच्या श्रद्धेची कसोटी पहाणारं ठरणार होतं एवढं खरं! त्या कसोटीला ताई अखेर खरी उतरली, पण त्यासाठीही तिने पणाला लावला होता तो स्वतःचा प्राणपणाने जपलेला स्वाभिमानच!

क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ एक विचार: मनःस्थिती बदला ☆ प्रा. सुनंदा पाटील ☆

प्रा. सुनंदा पाटील

? विविधा ?

☆ एक विचार: मनःस्थिती बदला ☆ प्रा. सुनंदा पाटील ☆

निलूच्या सूनबाई. मृणाल तिचं नाव. वय वर्षे चाळीस पार – साधारण पंचेचाळीस शेहेचाळीस. स्वतंत्र राहणारी. ” नवराबायको दोघं – चुलीस धरून तिघं ” या म्हणीप्रमाणे संसार सुरू असलेली. तिला एक मुलगा वय वर्षे वीस. एक मुलगी वय वर्षे सतरा.

नवरा खाजगी कंपनीत मोठ्या हुद्द्यावर नोकरीत असलेला. ती स्वतः एका बऱ्या कंपनीत नोकरीला आहे. सासू सासऱ्यांचा “जाच ” नाही. लग्न झाल्याझाल्याच तसं तिनं सांगितलेलं. त्यामुळे निवृत्त शिक्षिका सासूबाई आणि निवृत्त बँक ऑफिसर सासरे साधारण मोठ्या अशा आपल्या “गावी ” राहतात. खेड्यात नव्हे.

मुलं लहान असताना, कधी पाळणाघर, कधी बाई, कधी घरून काम असं तिनं ॲडजस्ट केलं. मुलांची शाळा, संगोपन सांभाळलं. दोन्ही मुलं १० ते ५ शाळेची झाली आणि मृणाल बरीच सुटवंग झाली. त्यांच्याच वेळात ही पण नोकरी करू लागली. सुख सुख ते काय म्हणतात, ते खूपच होतं.

दरवर्षी देश विदेशात कुठेतरी फिरणं होतं. गाडी, मोठासा फ्लॅट, आर्थिक बाजू उत्तम. पण हेच सुख कुठेतरी बोचू लागलं मृणालला. तिची सततची चिडचिड वाढली. उगाचच मुलांवर, नवऱ्यावर ओरडणं वाढलं. कारण कळेचना. समाजमाध्यमे आणि मैत्रिणी यावेळी कामी आल्या. “मेनॉपॉज ” नावाचं एक सत्र तिच्या आयुष्यात सुरू झालं होतं म्हणे. हार्मोन्स कमी जास्त झालेत की, असं होतं म्हणे. यावर उपाय एकच की, घरच्यांनी तिचे मुड्स, सांभाळायचे ! (आता इथे एवढा वेळ कुणाला आहे ?) शिवाय आजवर मी सर्वांसाठी केलं, आता तुम्ही माझ्यासाठी करा.

हे लिहिण्यामागचा हेतू एवढाच आहे की, खरंच मेनॉपॉज आणि मानसिक अवस्था यांचा म्हणावा इतका ” मोठ्ठा ” संबंध आहे का? हे कबूल आहे, की त्यावेळी जरा शारीरिक बदल होतात. पाळी येतानाही आणि जातानाही. मात्र गेल्या काही वर्षात हे ” त्रासाचं ” प्रमाण जरा जास्तच वाढलंय असं वाटतं.

मृणालचीच गोष्ट घेऊन बघू या ! नवरा आता मोठ्या पदावर आहे. त्याच्या जबाबदाऱ्या वाढल्यात. स्त्री – पुरुष असा बराच स्टॉफ त्याच्या हाताखाली आहे. जबाबदाऱ्या आहेत. घरी यायला कधी कधी उशीर होतो. शिवाय “तो अजूनही बरा दिसतो. “

मुलगा इंजिनिअरिंग थर्ड इअरला आहे. त्याचा अभ्यास वाढलाय. मित्रमंडळ वाढलंय. त्यात काही मैत्रिणीही आहेत. कॉलेज ॲक्टिव्हिटीज असल्याने घरात तो कमीच टिकतो. त्यात कॅम्पसची तयारी करतोय. मग त्याला वेळ कुठाय ?

मुलगी वयात आलेली. नुकतीच कॉलेजला जाऊ लागलीय. टीनएजर आहे. तिचं एक भावविश्व तयार झालेलं आहे. काहीही झालं तरी ती कॉलेज ” बुडवत ” नाही. घरी असली की, मैत्रिणींचे फोन असतात. सुटीच्या दिवशी त्यांचा एखादा कार्यक्रम असतो. फोनवर, प्रत्यक्ष हसणं खिदळणं, गप्पा होत असतात. तरीही ती आईला मदत करते. वॉशिंग मशीन लावणे, घरी आल्यावर भांडी आवरणे, अधेमधे चहा करणे. आताशा कूकर लावते, पानं घेते. जमेल तसं काही तरी ती करून बघते. जमेल तशी आईला मदत करते.

मृणाल मात्र आजकाल या प्रत्येकात काहीतरी खुसपट काढते. नवऱ्यावर पहिला आरोप, म्हणजे “त्यांचं माझ्याकडे लक्ष नाही. घरी मुद्दाम उशिरा येतात. ऑफिसमधे सुंदर बायका असतात, तिथेच ते जास्त रमतात. मी आता जुनी झाले, माझ्यातला इंटरेस्ट संपलाय वगैरे वगैरे. शिवाय आगीत तेल टाकायला आजुबाजुच्या सख्या असतातच. मग हा स्ट्रेस अधिक वाढत जातो.

बाळ आधीच्या सारखं आईच्या भोवती भोवती नसतं. त्यांच्यातला संवाद थोडासा कमी झालाय. कारण विषय बदललेत. ” आता माझी त्याला गरजच नाही ” या वाक्यावर नेहमीच तिची गाडी थांबते. त्याचं स्वतंत्र विश्व काही आकार घेतंय, ही गोष्टच तिच्या लक्षात येत नाही. ते बाळ आता हाफचड्डीतलं नाहीय. मोठं झालंय.

मुलीचंही तेच. तिच्या जागी स्वतः ला ती ठेवून बघतच नाही. सतत “आमच्यावेळी ” ची टकळी सुरू असते.

याचा दृश्य परिणाम एकच होत जातो की, ते तिघंही हळूहळू हिला टाळताना दिसतात. ” रोज मरे त्याला कोण रडे ” ही परिथिती येते. कारण कसंही वागलं तरी परिणाम एकच. कितीही समजून घेतलं तरी आई फक्त चिडचिड करते. मग त्याला एक गोंडस नाव मिळतं ” हार्मोन्स इम्बॅलन्स. मेनॉपॉज. “

डॉक्टरी ज्ञानाला हे चॅलेंज नव्हे, हे आधी लक्षात घ्या. पाळी येताना आणि जाताना बाईमधे अनेक बदल होतातच. पण ते ती कशा त-हेने घेते यावर अवलंबून आहे. जसं दुःख, वेदना कोण किती सहन करतं यावर अवलंबून असतं अगदी तसंच !

एक गोष्ट इथे शेअर करते. माझ्या बाळंतपणाच्या वेळी, माझ्या बाजूलाच माझ्या नवऱ्याच्या मित्राची बायको होती. मित्र संबंध म्हणून एकाच खोलीत आम्ही दोघी होतो. तिला पहाटे मुलगा झाला. ती आदली रात्र तिने पूर्ण हॉस्पिटलमधे रडून / ओरडून गोंधळ घालून घालवली. माझीही वेळ येतच होती. पण माझ्या तोंडून क्वचित ” आई गं ” वगैरे शिवाय शब्दच नव्हते. कळा मीही सोसतच होते. माझा लेबर रूममधून माझा ओरडण्याचा काहीच आवाज येत नाही हे बघून, माझी आई घाबरली. खूप घाबरली.. कारण आदली रात्र तिने बघितली होती.

रात्री बारा चाळीसला मला मुलगा झाला. माझं बाळ जास्त वजनाचं हेल्दी होतं. काही अडचणीही होत्या. पण सर्व पार पाडून नॉर्मल बाळंतपण झालं. तेव्हाच लक्षात आलं की, सुख दुःख हे व्यक्तीसापेक्षच असतं.

चाळीस ते पन्नास किंवा पंचावन्न हा वयोगट प्रत्येकच स्त्रीच्या वाट्याला येतो. एखादी विधवा बाई, संयुक्त कुटुंबातील बाई, परित्यक्ता, प्रौढ कुमारिका ते सगळं सहज सहन करून जाते. कारण ” रडण्यासाठी तिला कुणाचा खांदा उपलब्ध नसतो. ” तिला वेदना नसतील का? अडचणी नसतील का? पण ती जर रडत चिडत बसली तर, कसं होणार ? जिथे तुमचं दुःख गोंजारलं जातं, तिथेच दुःखाला वाचा फुटते. अन्यथा बाकिच्यांची दुःखे ही मूक होतात. असो !

हे सर्वच बाबतीत घडत असतं. कारण, परदुःख शीतल असतं. हे वाचून अनेकांचं मत हेच होईल की, ” यांना बोलायला काय जातं ? आम्ही हे अनुभवतोय. ” याला काही अंशी मी सहमत आहे. पण पूर्णपणे नाही. प्रत्येकच नवरा खरंच सुख बाहेर शोधतो का? घरातल्या पुरुषाला सुख बाहेर शोधावे लागू नये, इतकं घरातलं वातावरण नॉर्मल असलं तर तो बाहेर का जाईल ? आपल्या म्हणजे स्त्रियांच्या जशा अनेक अडचणी असतात, तशाच पुरुषांच्याही असतात, हे जर समजून घेतलं तर, वादाच्या ठिणग्या पडणार नाहीत. क्वचित पडल्याच तर तिचा भडका होणार नाही.

पंख फुटल्यावर पाखरंही घरट्याच्या बाहेर जातात, मग मुलांनी याच वयात आपलं करिअर करण्याचा प्रयत्न केला, तर सर्वतोपरी त्यांना मदत करायलाच हवी ना?

मुलींना वेळेतच जागं केलं, त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या तर मुलगीच तुमची मैत्रिण बनते. जरासं आपणही तिच्या वयात डोकावून बघावं. तिच्या ठिकाणी स्वतःला ठेवून बघावं.

आपली चिडचिड होणं स्वाभाविक आहेच. पण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की, रडून चिडून जर परिस्थिती बदलत असेल, तर खुशाल रडा. पण आहे त्या परिस्थितीशी आपली मनस्थिती जुळवून घेतली तर, आणि तरच घरात संघर्षाची परिस्थिती निर्माण होणार नाही. कारण कपड्याची एखाद्या ठिकाणची शिवण उसवली तर, जसं ज्याला शिवता येईल तसं शिवून टाकावं. अन्यथा तो कपडा कामातून जाईल हे लक्षात असू द्यावं.

यासाठी खूप काही करायला हवंय का? नाही ! आपला भूतकाळ आठवून वर्तमानाशी जुळवून घ्यावं. ” मी तरूण असताना मला माझी आईच तेवढी ग्रेट वाटायची. सासू नव्हे. ” हे आठवावं. बहीण भावाला आणि दीर नणंदांना दिलेले गिफ्ट आठवावे. आपल्या घरात सासर आणि माहेरपैकी कुठली वर्दळ अधिक होती/आहे हे बघावं. त्यानुसार आपल्या नवऱ्याचं वागणं, याचा विचार करावा.

विषय जरा वेगळ्या बाजूला कलतोय, हे कळतंय ! यावर पुढे सविस्तर बोलूच.

पण सध्या एवढंच लक्षात ठेवूया मैत्रिणींनो की, मेनॉपॉज किंवा तत्सम अडचणींवर सहज मात करता येते, त्याचा बाऊ न करता. त्यासाठी फक्त आपली मनस्थिती बदलूया!

© प्रा.सुनंदा पाटील

गझलनंदा

८४२२०८९६६६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares