मराठी साहित्य – विविधा ☆ झपूर्झा म्युझियम…  ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

? विविधा ?

झपूर्झा म्युझियम… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

(एक सुंदर सहल….)

 “झपूर्झा “म्हणजे काय हे प्रथम खरोखरच माहिती नव्हतं! आधुनिक मराठी काव्याचे जनक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कवी केशवसुत यांची”झपूर्झा “ही लोकप्रिय व गाजलेली कविता!

‘झपूर्झा ‘  म्हणजे ‘झपाटले पणाने जगणे’ असा अर्थ घेतला जातो.

‘जा पोरी जा’ हे वाक्य झपाट्याने उच्चारल्यास ‘झपूर्झा’ असा शब्द ऐकल्याचा भास होतो, तसा ध्वनी होतो असे ट्रान्स लिटरेशन फाउंडेशन शब्दकोश नमूद करते.

अर्थाचे असे काही वाद असले तरी ‘झपूर्झा’  खरोखरच आपल्याला ‘जगणे कसे असावे’ हे तेथील प्रदर्शनीतून दाखवून देते. पुण्याजवळ कुडजे, या गावाजवळ हे म्युझियम  आहे. प्रसिद्ध सराफ व्यावसायिक अजित गाडगीळ यांनी जुन्या गोष्टींचा संग्रह करून हे म्युझियम उभे केले  आहे. राजा रविवर्म्याची चित्रं ,१००/१५० वर्षांपूर्वीचे दागिने, साड्या, पैठण्या यांचे आठ वेगवेगळ्या गॅलरींमध्ये प्रदर्शन  आहे. पु. ल. देशपांडे म्हणतात त्याप्रमाणे कला, चित्र, नाट्य, शिल्प या सर्वांशी इथे मैत्री जोडली जाते….

७ जानेवारीला योगा सेंटर ची *झपूर्झा*ला ट्रिप नेण्याचे ठरले आणि आम्ही दोघे त्यांंत सहभागी झालो.१७/१८ जणांची ट्रॅव्हलर गाडी बुक केली होती.. सकाळी १० वाजता निघालो.साधारणपणे पाऊण तासात आम्ही तिथे पोचलो.सकाळचे प्रसन्न वातावरण होते.घरून नाश्ता करून निघालो होतो, तरी वाटेत छोटे छोटेखाद्य पदार्थ खाणे चालूच होते.

‘झपूर्झा’ च्या गेटवर पोहोचल्यावर तिकिटे काढली आणि आत प्रवेश केला.( शनिवार/ रविवार रेट जास्त असतो) आत प्रवेश केल्यावर प्रथमच नटराजाच्या मोठ्या मूर्तीचे दर्शन झाले. केशवसुतांची एक कविता आपले स्वागत करताना दिसली. आणि लक्षात आले की हे नुसतेच प्रदर्शन नाही तर इथे चांगल्या वाचनीय अशाही बऱ्याच गोष्टी आहेत.

शिरीष बेरी या प्रसिद्ध आर्किटेक्टने साडेसात एकर जागेत हे संग्रहालय उभे केले आहे. अतिशय निसर्गरम्य असे वातावरण तिथे आहे. खडकवासला धरणाच्या बॅकवॉटर जवळ हे ठिकाण असल्यामुळे हवेमध्ये चांगला गारवा असतो!

म्युझियमचा एकूण नकाशा पाहता तिथे आठ गॅलरीज्, ॲम्फी थिएटर, कॅफेटेरिया, ऑडिटोरिअम,सुवेनिअर शाॅप अशी सर्व दालने आहेत.

हे सर्व पाहण्यासाठी तीन-चार तास वेळ लागतो. तसेच इथे” पूना गेस्ट हाऊस”चे नाश्ता आणि भोजन यासाठी चांगले उपहारगृह असल्याने बरोबर खाद्यपदार्थ न्यावे लागत नाहीत आणि तशी परवानगीही नाही.

‘लाईट ॲन्ड लाइफ’ या पहिल्या दालनात सर्व प्रकारचे दिवे बघायला मिळतात. पितळ्याचे, चांदीचे, देवापुढील दिवे, समया, असे विविध प्रकारचे दिवे तेथे बघायला मिळतात.

दुसऱ्या दालनास’ ‘प्रिंट अँड इन प्रिंट ‘असे म्हणतात. तेथे छपाई तंत्राचा शंभर वर्षाचा इतिहास तसेच प्रिंटिंग संबंधी सर्व माहिती आहे. राजा रविवर्म्याची पेंटिंग्ज आहेत. चॉकलेटचे डबे, ट्रे,फ्रेम्स अशा जुन्या वस्तूंचे असंख्य नमुने आहेत.

तिसऱ्या दालना मध्ये 1832 च्या दरम्यान असणाऱ्या चांदी सोन्याच्या वस्तू, दागिने, भातुकली, विविध प्रकारच्या फण्या, सौंदर्य प्रसाधनांचे डबे, अत्तर दाण्या, गुलाब दाण्या इत्यादींचे प्रकार पाहायला मिळतात.

चौथ्या दालनात दुर्मिळ पैठण्यांचा  संग्रह आहे. तिथे प्रवेश करताच इंदिरा संत यांची “पैठणी” कविता वाचायला मिळते. पेशवाईतील विविध पैठण्या तेथे संग्रहित केल्या आहेत.

स्थापत्य कलेशी संबंधित निसर्गाशी मेळ घालणारे असे पाचवे दालन आहे. तिथून जवळच कॅफेटेरिया  आहे. इथे सर्व प्रकारचे खाद्यपदार्थ तसेच उकडीचे मोदक, पुरणपोळी, खास पुणेरी अळू यासह असणारे जेवण मिळते ,त्यामुळे अशा सुंदर जेवणाचा आस्वाद घेऊन पुन्हा फिरायला आणि फोटोग्राफी करायला उत्साह येतो.

बसण्यासाठी सुंदर जागा, समोर दिसणारे धरणाचे पाणी, वाटेत असणारे कमळाचे पाॅड्स आणि शेवटी असणारे शंकराचे मंदिर असा सर्व परिसर बघता बघता वेळ कसा जातो ते कळतच नाही!

साॅव्हनेअर शॉप हे बायकांच्या खरेदीचे आवडते ठिकाण! तिथे विविध प्रकारच्या पिशव्या, टी-शर्टस्, मग्ज्, पेंटिंग्ज, अशा विविध प्रकारच्या वस्तू आहेत.  विंडो शॉपिंग आणि थोडीशी खरेदी तेथे होतेच!

एक दिवस निसर्गरम्य परिसरात आनंदात घालवण्यासाठी हे ठिकाण खरोखरच अप्रतिम आहे! अजित गाडगीळ यांनी  ‘झपाटलेपणाने जगणे’ हा अर्थ खरोखरच सार्थ केला आहे हे  म्युझियम उभारताना!

आमचा सहलीचा दिवस असाच अविस्मरणीय झाला.जेवण आणि फिरणे करून येताना ३ च्या दरम्यान आम्ही सर्वजण योगा सेंटर मधील मनीषा मॅडमच्या घरी चहा, बिस्किटे घेऊन फ्रेश झालो.

लहानशा खेड्यातील त्यांचे घर खूपच छान वाटले. घराभोवती फुलांची झाडे , शेवग्याचे झाड तसेच छोटी छोटी वांग्याची झाडे पाहून आनंद वाटला.. येताना ताजे ताजे मुळे,पालक, चाकवत, शेवगा अशा खास गावाकडच्या ताज्या भाज्या घेतल्या.

निसर्गाचे हे रूप पाहून वाटत होते की, शहराच्या कृत्रिम जीवनापेक्षा हे किती आकर्षक आहे आणि निसर्ग आपल्याला किती देत असतो!

“देता किती घेशील तो कराने..”

अशी आपली अवस्था होते!

संध्याकाळी एकमेकांचा निरोप घेऊन घरी आलो. कालचा   संस्मरणीय दिवस मनामध्ये कायमचा घर करून राहीला!

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “वर्षाऋतू…” ☆ श्री वैभव चौगुले ☆

श्री वैभव चौगुले

? विविधा ?

☆ “वर्षाॠतू…” ☆ श्री वैभव चौगुले ☆

खूप प्रेम करतोय मी निसटणा-या वर्षाऋतूवर! रेत मुठीतून निसटून जाते. तसे हे वर्ष अखेर निसटून जाताना मला दिसत आहे. पण या वर्षअखेर मी शून्य होणार आहे. हे माझ्या मनाला सांगून ठेवले आहे. कारण दान देत रहावे. पुण्य कमवत रहावे. कर्म चोख आणि वचन निभवावे. असाच फंडा माझ्या जीवनाचा मी करून ठेवला आहे. सुखाला दु:ख आणि दु:खाला सुख टिकून देत नाही. हे मी खूपदा अनुभवले आहे. म्हणुन सुखदु:खाची नाळ माझ्या संयममय संघर्षाशी बांधून ठेवली आहे.

वेळ आहे. निघून जाणार! हे शेवटी अटळ सत्य! भावनांच्या हिंदोळ्यावर! किती स्वप्नझुले झुलताना मन हसते. चोरपावलांनी आलेल्या आधार शब्दलहरीवर हरेक झुला गगनाला भिडतो! वारा झोका देत असताना सांजवेळी बासरीची धून मारव्यासोबत समीप होऊन माझ्या मनाला साद घालते. वसुंधरेने नेसलेला हिरवा शालू, आभाळाच्या ललाटी दिसणारा सोनेरी टिळा! पाहत पाहत, नववधुचा शृंगार दवबिंदुंचा साज पांघरून इंन्द्रधनुच्या रंगात रंगून जाताना!  माझे मन हरकून जाते. मनाच्या पैलतिरावर उन्मळून आलेल्या माझ्या भावना! मला आता कित्येक प्रश्न विचारू लागतात.

माझ्या खांद्यावरचे ओझे कुणीतरी उचलले! आणि मी मुक्तमोकळा श्वास घेत आहे. हे कल्पनेत नाहीतर! सत्यात उतरत पूर्ण झालेले स्वप्न! खरचं माझे हसून स्वागत करते. मी दिलखुलासपणे पाहत असतो. मी दिले काय? आणि मिळाले काय? याचा हिशोब मला सरते वर्ष देईलच! यात शंका नाही.

मी पूजा करतो. ती वर्षाऋतुची मूर्ती मंदिरातून गहाळ झाली. हे नियतीने दाखवून दिले. तेव्हा मी चोराला दोष दिला नाही. तर मीच ती मूर्ती कोरीव, सुभक आणि सुंदर घडवली. याचा मला खूप अभिमान वाटतो. यात चोराचे काही चुकले असेल! असे मला वाटत नाही. मग ती मूर्ती मनमंदिरी असो, वृंदावनी असो की एखाद्या नदी किनारी कदंबाजवळ असो! त्या मूर्तीसाठी शृंगाराची लेणी मी कोरून ठेवलेली आहेत. नवरसातले अमृत! मी माझ्या काळजात लपवून ठेवले आहे. फक्त मला या वर्षाऋतुसाठी गंधाळायचं आहे. इतकेच समजते! मनातून असा पाझर बाहेर येईपर्यत, अश्रू वाट अडवतात. अश्रूही अमृतमय होऊन जातात. मी एकदा अश्रू चाखून पाहिले आहेत. चव खारटचं! कोणता सागर त्या नयनरम्य परिसरामध्ये उसळत आहे! की वास्तवास आहे. मला अजून कळाले नाही. की त्या सागराचा किनारा कोणता? की किनाराच नाही. कसं सगळं समभ्रमीत ?

मी समर्पीत केलेले हरेक क्षण! माझा हेवा करतात. या वर्षाऋतूवर प्रेम करत असताना! मी खूप गोष्टींचा त्याग केला. या त्यागलेल्या गोष्टीशी तसा माझा कोणता घनिष्ठ सबंध नाही. नव्हता! म्हणून माझ्यापासून दुरावलेल्या गोष्टींची मला कधी साधी आठवणही येत नाही. आणि कधी येणारही नाही. एक ऋतू मनाला भावल्यानंतर नवे ऋतू, दहा दिशा अन् सहा सोहळ्यांच्या भ्रमीष्ठ भानगडीत कधी मी पडलो नाही. पडणारही नाही.

पतझड सावन बसंत बहार

एक बरस के मौसम चार मौसम चार

पांचवा मौसम प्यार का इंतजार का…

असे गुनगुनणारे माझे मन! नेहमी वर्षाऋतुच्या वाटेवर नजर रोखून असते. वचनबध्द, साचेबंध असलेले! माझे मन जरी थोडेफार हेकेखोर, गर्विष्ठ असले तरी ते दगाफटका करणारे नाही. याची खात्री मला आहे. शब्दांनी आधार मिळतो. पण कर्तव्याचं आणि जबाबदारीचे ओझे मात्र कमी होत नाही. त्याला समोर येऊन! हातभारच लावावा लागतो. मनानी करावे गुन्हे! अन् शरीराने भोगावी शिक्षा! हा न्यायनिवाडा मला मान्य नाही. ओंजळीतल्या सरींना! मी खाली पडून देणार नाही. की माझ्या जीवनरेखा कुणाला पुसून देणार नाही. ज्या भावनांनी मी चित्र रेखाटले. ज्या वैभवमय रंगांनी मी चित्र रंगवले. ते चित्र मी कोणत्या प्रदर्शनात मांडणार नाही. त्या वैभवमय झालेल्या चित्राला जगण्यासाठी लागणारा श्वास माझ्या श्वासातूनच देत राहीन! रोज नव्याने रंग भरत राहीन! या चित्राची जागा मनाच्या खोल कँनव्हासवरच  असेल आणि राहील.

जुन्या विचारांची पाने झडून गेल्यानंतर! चैतन्यमय विचारांच्या नवपालवीचे स्वागत करायला! मी सज्ज होणार आहे. ऋतुच्या मनराईतून प्रेमफुलांच्या कळ्या उमलू लागतात. तेव्हा मनभावनांच्या सुगंधी उत्कंटतेला आवर मला घालता येत नाही. हे तितकेच खरे आहे. चोरीला गेलेली मूर्ती पवित्र राहील! कारण तिच्या चरणी मी रोज सत्यफुले वाहिली होती. म्हणतात मूर्ती निर्जीव असते. पण मी माझ्या वर्षाऋतूमध्ये जीव ओतला आहे. त्यामुळे माझ्या भावनांची जाण नक्कीच वर्षाऋतुला असणार कदाचित! गतवर्षाऋतुची कात टाकताना! माझा ऋतू मी वसंतास बहल करेन!  मग तो ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत की शिशिर असो! ऋतू सूर्यावर आणि महिने चंद्रावर ठरतात!  निसर्गाची किमया कुणाला माहीत नाही. वर्षाऋतुचा खेळही असाच! हा खेळ सावल्यांचा! यामधल्या सावल्यांना मुखवटे नसले तरी भावना मात्र मी ओळखत असतो. सावल्यांच्या लपंडावामध्ये नेहमी वर्षाऋतूवर का डाव येतो! हे कळत नाही. की ती टाईमप्लीज म्हणून डाव अंगावर ओढून घेते. हे ही समजत नाही.

पण माझे ऋतू आणि महिने माझ्या स्वाभिमानावर आणि माझ्या वेळेवर, परतीच्या क्षणांवरच  ठरत असतात.. किंभवना मी ठरवत असतो. आणि वर्षाऋतुचा शृंगार करण्यास शिंपल्यातले मोती वेचून भावस्पर्शाच्या ओंजळीत साठवत असतो. वर्षाऋतुच्या प्रतीक्षेत….!!!!!!!

© श्री वैभव चौगुले

सांगली

मो 9923102664

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ‘माझी सुट्टी…’ ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

?  विविधा ?

☆ ‘माझी सुट्टी’ ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

खूप दिवसांपूर्वीची गोष्ट. दिवस कुठले, वर्षे लोटली. म्हणजे वीस – पंचवीस वर्षे सहज.  आणि गोष्ट म्हणजे काय, तर हकीकत म्हणा, किंवा अनुभव म्हणा.  त्यावेळी मी डी.एड.कॉलेज सांगलीमधे अध्यापन करत होते. मला शिकवायला आवडायचं आणि मुलींमध्ये रामायलाही. तेवढंच तरुण झाल्यासारखं वाटायचं. म्हणजे जॉब सटिस्फॅक्शन वगैरे म्हणतात नं, ते होतं, पण तरीही दिवाळी आणि मे महिन्याच्या सुट्टीचे वेध लागायचेच. तेव्हा सुट्टी लागली, की मी यंव करीन अन् त्यव करीन असे मांडे मनात भाजत आणि खात रहायची. त्यातले काही मांडे असे —

पहाटे लवकर उठून व्यायाम आणि प्राणायाम करणे. सकाळी फिरायला जाणे. हे अगदी मस्टच, मी ठरवलं. सुट्टी असल्यामुळे सगळं आही आरामात आवरायचं, दुपारी पंख्याखाली अडवारायचं आणि मनसोक्त दिवाळी अंक किंवा पुस्तकं वाचायची. संध्याकाळी शेजारणी, सख्या- मैत्रिणी यांच्याकडे जाऊन गप्पांचे फड उठवणे , हाही आखलेला बेत असे. एरवी कॉलेजमधून घरी येताना नजरेच्या टप्प्यात जेवढ्या येतील, त्यांना ‘काय कसं काय?’ विचारणं आणि ‘ठीकय.’ ऐकणं, या पलीकडे संवादाची मजल जात नसे.

पहाटे उठण्यासाठी गजर लागे. आधी घड्याळाचा, नंतरच्या काळात मोबाईलचा. गजर झाला की मनात येई, लवकर उठणं नि नंतरची लगबग नेहमीचीच आहे मेली. आज आरामात पांघरूणात गुरफटून पडून राहण्याचं सुख अनुभवू या. उद्यापासून सुरुवात करू. पण तो उद्या कधी उजाडत नसे. तो ‘आज’ होऊनच उगवे. व्यायाम, प्राणायाम, पक्ष्यांची किलबिल हे सगळं राहूनच जायचं. नाही तरी किलबिल ऐकायला आता शहरात पक्षी राहिलेतच कुठे, मी मनाशी म्हणे. मला आणि मुलांना सुट्टी असे, पण यांना ऑफीस असल्यामुळे यांचा डबा साडे नऊला तयार असणं गरजेचं असे. त्यामुळे सकाळची कामाची धांदल नेहमीसाराखीच करावी लागे, सुट्टी असूनसुद्धा. माझ्याप्रमाणे मुलांनीही सुट्टीचे कार्यक्रम ठरवलेले असायचे. पोर्चमध्ये उभे राहून गप्पा, किंवा मोबाईलवर चॅटिंग, यू ट्यूबवरचे सिनेमे बघणे, घरात पसारे करणे, त्यांच्या सवडीने जेवायला येणे, आई घरात आहे, म्हंटल्यावर आईनेच जेवायला वाढणे, अपेक्षित. त्यातून बाहेर पडले की माझे लक्ष, कपड्यांनी, भांड्यांनी, पुस्तकांनी ओसंडून वहाणार्‍या कपाटांकडे जाई॰ दिवाळीसारखा महत्वाचा सण. घर स्वच्छ, नीटनेटकं नको, असं मला आणि मलाच फक्त वाटे. घरातल्या इतर कुणाला नाही. ही आवारा-सावर होईपर्यंत दिवाळीचे पदार्थ करायचीचे वेळ येई. पणत्या, वाती, उटणं, नवा साबण किती म्हणून तयारी करावी लागायची. दिवाळीच्या दिवसात रोज एक नवीन पक्वान्न हवंच. ‘तुझं गोड नको बाई, काही तरी चमचमीत कर’, अशी मुलांची मागणी. मागणी तसा पुरवठा करायलाच हवा ना, शेवटी आपलीच मुलं. जेवणं- मागचं आवरणं. दुपारचे सहज तीन वाजून जात.  मग एखादा दिवाळी अंक घेऊन फॅनखाली पडावं, तर डोळे मिटू मिटू होत. मासिकातील अक्षरे पुसट होत जात आणि मासिक हातातून कधी गळून पडे, कळतच नसे. नाही म्हणायला, संध्याकाळी शेजारणी, सख्या- मैत्रिणी यांच्याकडे जाऊन गप्पांचे फड उठवणे, हा आखलेला बेत बराचसा तडीला जाई.

दिवाळी येई-जाई. कॉलेज पुन्हा सुरू होई. दिवस- महिने संपत. मार्च उगवे. पोर्शन शिकवून संपलेला असे आणि आता पुन्हा मोठ्या सुट्टीचे वेध लागत. आता मांडे मनात नाही, ताटात घेऊन खायचे, मी नक्की ठरवते. वाटतं, सुट्टीत कुठे तरी फिरून यावं. नवा प्रदेश पहावा. निसर्गाच्या सहवासात काही काळ घालवावा. ताजंतवान होऊन, नवी ऊर्जा घेऊन परत यावं आणि नव्या दमाने, नव्या उत्साहाने नेहमीच्या दिनचर्येला सुरुवात करावी. पण या महिन्यातल्या क्लासचे, परीक्षांचे मुलांचे वेळापत्रक, कधी कुणाचे आजारपण, घरातली, जवळच्या नात्यातील लग्ने या गोष्टी अ‍ॅडजेस्ट करता करता ट्रीपचं वेळापत्रक कोलमडून जाई. दिवाळी काय किंवा उन्हाळी सुट्टी काय, दरवर्षी थोड्या-फार फरकाने असंच काही-बाही होत राहिलं.

दिवस- महिने- वर्षे सरत आली. माझ्यासाठी कॉलेजची शेवटची घंटा वाजण्याची वेळ आली. एकीकडे कासावीस होत असतानाच मी मनाला समजावू लागले,

आता मला सुट्टी मिळणार मिळणार

खूप खूप मज्जा मी करणार करणार.

आता मला खरंच सुट्टी मिळाली आहे. आता आरामात उठायला हरकत नाही. आता साडे नऊच्या डब्याची घाई नाही. मुलांची जबाबदारी पण आता उरलेली नाही. ती आपापल्या नोकरीच्या गावी, आपआपल्या संसारात, मुलाबाळात रमली आहेत. सकाळी आता उशिरा, आरामात उठायचं. मी निश्चय करते. पण काय करू? जागच लवकार येते आणि एकदा जाग आल्यावार नुसतच आंथरूणावर पडून रहावत नाही. पूर्वी पाहिलेली स्वप्ने आता आळोखे- पिळोखे देत जागी होऊ लागली.

आता सकाळी जाग आल्यावर उहून फिरायला जायचं मी ठरवलं.  उत्साहाने जिना उतरू लागले, तर गुढगे आणि कंबर म्हणाली, ‘बाई ग, आता आमचा छळ थांबव!’ कमरेला चुचकारत नवा महागडा कंबरपट्टा आणून तिला नटवलं. गुढग्यांवरही छान उबदार वेष्टण चढवलं. पण त्यांचं तोंड वाकडंच. ते काही बेटे सहकार्य करेनात. शेवटी डॉक्टरांशी बोलले. डॉक्टरांनी क्ष-किरण फोटो काढला. फोटो बघत ते म्हणाले, ‘ आता या गुढग्यांना निरोप द्या काकू! आता नवे गुढगे आणा!’ तसे केले. नवे गुढगे घेऊन आले पण चालताना, इतकंच काय, बसताना, झोपतानाही पायाला वेदना होऊ लागल्या. पुन्हा डॉक्टर. पुन्हा क्ष-किरण फोटो. डॉक्टर म्हणाले, ‘ पाठीच्या कण्याच्या चौथ्या – पाचव्या मणक्यांनी गळामिठी घातलीय, ती सोडवायला हवी. ती सोडवली. मग मात्र माझे पाय वेदनारहित झाले. हळू हळू फिरणं वगैरे जमू लागलं. पण डॉक्टरांनी बजावलं, ‘आता चालताना हातात काठी घ्या.’ आणि एक लोढणं गळ्यात नव्हे हातात आलं.

आता टी.व्ही. बाघायला वेळच वेळ होता. पण हळू हळू लक्षात येत गेलं, आपल्याला सिरियल्समधले संवाद नीट ऐकू येत नाहीयेत. टी.व्ही.च्या जरी जवळ बसलं, तरी फारसा उपयोग होत नाहीये. कानांकडे तशी तक्रार केली, तर ते म्हणाले, ‘आम्हाला गळामिठी घालायला एक सखा आण. त्याचे लाड-कोड पुरवले. पण त्यांचा हा सखा इतका नाठाळ निघाला, सगळा गलकाच ऐकवू लागला. नको ते आवाज मोठ्या प्रमाणात घुमवू लागला. हवे ते दडवून ठेवू लागला. थोडक्यात, हा कांनांचा सखा, असून अडचण अन नसून खोळंबा झाला.   शेवटी मूकपट पाहून नाही का आपण आनंद घेत, तसाच टी.व्ही. बाघायचा, असं ठरवून टाकलं.

आता वाचायला खूप वेळ होता. चांगली पुस्तकेही हाताशी होती. पण—-

इथेही पण आलाच. निवृत्तीपूर्वीच डोळ्यांवर डोळे चढवून झाले होते. ते साथही चांगली देत होते. पण बालहट्टाप्रमाणे त्याचे काही हट्ट पुरवावे लागायचे. बसून वाचायाचं. झोपून वाचायाचं नाही. तसं वाचलंच तर उताणं झोपायचं कुशीवर नाही. हे हट्ट पुरवल्यावर त्याची काही तक्रार नसायची. पण तो डोळयांवरचा डोळा जरी चांगलं काम करत असला, तरी मूळ डोळा अधून मधून म्हणायला लागला, ‘आता मी शिणलो. आता पुरे कर तुझं वाचन!’  मी नाहीच ऐकलं, तर तो सारखी उघड –मीट करत स्वत:ला मीटूनच घ्यायचा.

तर असं हे माझं सुट्टीपुराण. जेव्हा दात होते, तेव्हा चणे नव्हते. आता भरपूर चणे आहेत, तर खायला दातच नाहीत.

© सौ उज्ज्वला केळकर 

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170 ईमेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ उगवतीचे रंग – तुम्ही युनिक आहात… ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? विविधा ?

☆ उगवतीचे रंग – तुम्ही युनिक आहात… ☆ श्री विश्वास देशपांडे

उगवतीचे रंग – तुम्ही युनिक आहात…

मागे एका शाळेत गेलो होतो. ती शाळा खूप प्रसिद्ध म्हणून पाहायला. त्या शाळेच्या ऑफिसमध्ये एक वाक्य वाचायला मिळालं. ‘ एव्हरी चाईल्ड इज  युनिक. ‘ आणि अगदी खरं आहे. प्रत्येक मूल दुसऱ्या मुलापासून वेगळं आहे. बुद्धीनं, रूपानं , विचारानं, भावनेनं. प्रत्येकाची प्रत्येक गोष्ट करण्याची क्षमता वेगवेगळी. जे एकाला खूप चांगलं जमतं , तसं दुसऱ्याला येईलच असे नाही सांगता येत. आपण पालक मात्र ही गोष्ट समजूनच घ्यायला तयार नसतो. एखादा मुलगा अभ्यासात हुशार असला तर आपण आपल्या मुलाला त्याचे उदाहरण देतो. तो अमुक अमुक बघ. कसा हुशार आहे. गणितात किती गुण मिळाले त्याला ! नाहीतर तू .. असे म्हणून आपण त्याला हिणवतो. आणि त्याचं फुलू पाहणारं व्यक्तिमत्व कोमेजण्यासाठी हातभार लावतो. अरे, निसर्गातही बघा ना. प्रत्येक फुल वेगवेगळं आहे. गुलाब फुलांचा राजा झाला म्हणून काय इतर फुलांचं सौंदर्य, सुगंध कमी आहे का ? प्रत्येक फुल आपापल्या ठिकाणी श्रेष्ठ आहे. सगळेच गुलाब झाले तर कसे चालेल ? फुलांच्या हारामध्ये जेव्हा वेगवेगळ्या रंगांची फुलं असतात, तेव्हा तो हार शोभून दिसतो.

पण आज मला लहान मुलांबद्दल आणि त्यांच्या शिक्षणाबद्दल नाही बोलायचं. पण त्यानिमित्ताने एक विचार मात्र मनात आला. प्रत्येक लहान मूल युनिक असतं तसं आपण मोठी माणसं पण असतो का ? नक्कीच असतो. पण हे आपण समजून नाही घेत. कदाचित समजतं पण उमजत नाही. कळतं पण वळत नाही. अशी आपली अवस्था असते. आणि बऱ्याच वेळा हेच आपल्या दुःखाचं मूळ असतं . मी काय करतो, तर माझी तुलना सतत दुसऱ्याशी करत असतो. एखादा माणूस तब्येतीने चांगला दिसला, दिसायला त्याचे व्यक्तिमत्व छाप पडणारे असले की मी नकळत माझी तुलना त्याच्याशी करतो आणि दुखी होतो. मला वाटतं मी एवढा बारीक आणि अशक्त का ? जे माझ्या बाबतीत तेच एखाद्या लठ्ठ माणसाला सुडौल असणाऱ्या माणसाबद्दल वाटू शकेल. त्या लठ्ठ माणसाला वाटते की मी का नाही असा सडपातळ ? लोक हसतात माझ्याकडे पाहून. एखाद्या बुटक्या माणसाला उंच माणसाबद्दल हेवा वाटू शकतो. एखाद्या आखूड केस असणाऱ्या तरुणीला लांब आणि दाट केस असलेल्या स्त्रीबद्दल असूया वाटू शकते.

अशा अनेक गोष्टींमुळे आपण स्वतःला दु:खी करून घेतो. इथे आपले चुकते ते हे की आपण स्वतःला आहे तसे स्वीकारायला तयार नसतो. पण निसर्ग तुमच्यात जेव्हा तुम्हाला वाटणारी एखादी उणीव ठेवतो, तेव्हा तुम्हाला तो अशी काही गोष्ट देऊन ठेवतो, की जी दुसऱ्याजवळ नसते. एखाद्या धनिकाला सगळ्या गोष्टी उपलब्ध असून शांत झोप लागत नाही. तेच झोपेचे वरदान देव मात्र एखाद्या सर्वसामान्य माणसाला सहज देऊन ठेवतो. तो श्रीमंत माणूस सगळे विकत घेऊ शकतो. पण झोप नाही विकत घेऊ शकत. मनःशांती नाही मिळत पैशाच्या जोरावर. अशा खूप गोष्टी असतात आपल्याजवळ. या अर्थाने आपण गिफ्टेड असतो. पण आपण नेमके आपल्याजवळ असलेल्या गोष्टींचा विचार न करता आपल्याजवळ नसलेल्या गोष्टीचा विचार करतो.

या अर्थाने खरं तर प्रत्येक व्यक्ती युनिक आहे. वेगळी आहे. मी मुद्दामच या लेखाचं नाव तुम्ही युनिक आहात असं दिलंय . खरं म्हणजे बरेचदा मी इंग्रजी शब्द वापरायचे टाळतो. पण काही वेळा आपल्याला अपेक्षित असणारा अर्थ एखादा शब्द चटकन स्पष्ट करत असेल तेव्हा मी तो बिनदिक्कतपणे वापरतो. इंग्रजीतला युनिक हा शब्दही असाच. युनिक म्हणजे एकमेवाद्वितीय. इतरांपासून एकदम वेगळा. आपण सगळे या अर्थाने युनिक असतो. इतरांपासून वेगळे असतो. मला गाणी आवडतात, प्रवास आवडतो, वाचायला आवडते, लिहायला आवडते. दुसरा माझा एक मित्र उत्तम चित्रं काढतो आणि लिहितोही. तो फिरत मात्र फारसा नाही. कोणी उत्तम गातो. कोणाला उत्तम स्वयंपाक करता येतो. कोणीतरी उत्तम खेळाडू आहे. किती हे वेगळेपण ! किती या प्रत्येकाच्या तऱ्हा ! म्हणून तर प्रत्येक जण युनिक. हे जेव्हा आम्ही समजून घेऊ ना, तेव्हा आम्ही स्वतःवर प्रेम करायला लागू. (उगवतीचे रंग- विश्वास देशपांडे )

आणि जो स्वतःवर प्रेम करू शकतो, तोच इतरांवरही प्रेम करू शकतो. पण आपल्याकडे ही गोष्ट लहानपणापासून सांगितलीच जात नाही. उलट सांगितलं जातं . की स्वतःचा विचार करू नका. स्वतःवर प्रेम करू नका. दुसऱ्यावर प्रेम करा. पण स्वतःवर प्रेम नाही करता आलं, स्वतःला आहे तसं नाही स्वीकारता आलं , तर तुम्ही दुसऱ्याला काय स्वीकारणार आणि मग प्रेम करणं तर लांबची गोष्ट !

तेव्हा आजपासून स्वतःला सांगू या की मी इतरांपेक्षा अगदी वेगळा आहे, युनिक आहे आणि त्यातच माझे सौंदर्य आहे, सामर्थ्य आहे. इतरांना दिल्या त्यापेक्षा परमेश्वराने मला काही गोष्टी नक्कीच वेगळ्या दिल्या आहेत. त्यांचा मी विचार करीन . त्यांचा वापर करून माझे जीवन आनंदी बनवेन. आणि त्याच बरोबर इतरांचेही. आणि मग बघा. तुमच्याही ओठांवर आनंदाचे गाणे आल्याशिवाय राहणार नाही.

लिये सपने निगाहो में, चला हूँ ‘तेरी राहों मे

जिंदगी, आ रहा हूँ मैं ….

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ भक्तिसेतू साधणारा एक असाही अनुबंध ! ☆ श्री दर्शन रमेश वडेर ☆

? विविधा ?

☆ भक्तिसेतू साधणारा एक असाही अनुबंध ! ☆ श्री दर्शन रमेश वडेर 

नृसिंहवाडी ते अयोध्या..

भक्तिसेतू साधणारा एक असाही अनुबंध !

– दर्शन रमेश वडेर, नृसिंहवाडी

प्रभू श्रीरामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना अयोध्येच्या दरबारी होत आहे. अवघा शरयूतीर या हर्षोल्हासाने पुलकित झालाय. रामनामाचा ब्रह्मनाद अवघ्या आसमंताला व्यापून उरतो आहे. संतजनांच्या स्वस्तिपद्मांमुळे अयोध्येच्या पवित्र भूमीत मांगल्याचा उमाळा दाटून आला आहे. “मेरे झोपडीके द्वार आज खुल जायेंगे, राम आयेंगे” असं म्हणणारी माता शबरी असो किंवा रामचंद्रांना हृदयस्थ मित्र मानून गंगेचे पात्र ओलांडून देणारा केवट.. अयोध्येच्या कुठल्याशा कोपऱ्यात बसून ते आज आनंदाने अश्रू ढाळत असतील. वानरराज सुग्रीवाची अवघी वानरसेना अदृश्यरूपाने हा मंदिररुपी सेतू उभारत असेल तो हृदयात ‘जय श्रीराम’चा महामंत्र घेऊनच! कारण ५०० वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर श्रीराम प्रभूंच्या मंदिराचे स्वप्न साकार होतंय. क्षीरसागरातले अवघे वैकुंठच अयोध्यानगरीत उतरलंय की काय? असा भास व्हावा, अशी ही दिव्यता हृद्यचक्षूंना कृतार्थ करते आहे. स्वयंवरातल्या सीतामैय्याच्या शृंगारासारखी अयोध्या रुपांकित झाली आहे. भारतवर्षातल्या अनेक सुपुत्रांच्या त्यागानंतर आज अवधनगरीला हे साजिरं रूप मिळालंय. हजारो कारसेवकांच्या प्रयत्नांनी अन् रामजन्मभूमी न्यासाच्या अविरत संघर्षानंतर आजचा हा सोनियाचा दिवस उजाडला आहे. यात आपल्या पुण्यभूमी नृसिंहवाडीचाही एक जिव्हाळ्याचा अनुबंध आहे. गुरुकृपेचा अन्योन्य हृद्य अनुभव देणारा असा हा नृसिंहवाडी ते अयोध्या भक्तीसेतू !

दत्तप्रभूंच्या पद्मयुगुलांनी कृपांकित झालेली पुण्यभूमी नृसिंहवाडी म्हणजे सत्पुरूषांची जननीच! अनेक थोर महात्मे व संतजनांनी या भूमीत भक्तीरसाची उधळण केली अन् कृष्णेचा निळाशार डोह शहारून गेला. “आम्ही दत्ताचे नौकर, खातसो त्याची भाकर” असे म्हणत तिन्ही त्रिकाळ पूजाअर्चा करणारे वाडीचे समस्त पुजारीजन म्हणजे प्रत्यक्ष दत्तगुरुंचीच लेकरे! याच पवित्र पुजारीकुळात सूर्याचे तेजोवलय मानव देहावर घेऊन जन्माला आलेली एक थोर विभूती म्हणजे ब्रह्मर्षी पं. आत्मारामशास्त्री जेरे! वाडीच्या ज्ञानासनावर विलक्षण गारूड निर्माण करतील अशा मोजक्या मांदियाळीत जेरेशास्त्रींचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. त्यांच्या विद्वत्तेचा सूर्य जितका प्रखर अन् तेजस्वी तितकाच शारदीय चांदण्यात नाहल्याची अनुभूती देणारा. वेद, उपनिषद, न्याय, वेदांत, मीमांसा अशा धर्मशास्त्राचे त्यांचे ज्ञान अफाट होते. संस्कृत आणि तत्वज्ञानावरील त्यांच्या अभ्यासाचा अधिकार प्रचंड होता. मात्र शिक्षणाचा अन् योग्यतेचा दर्जा असूनही नोकरीसाठी उपेक्षा होत होती. त्यामुळे त्यांनी प.पू. टेंबे स्वामींच्या स्त्रोत्रांचे अखंड अनुष्ठान सुरू केले होते. तेव्हा प.प. शांतानंद स्वामींनी दृष्टांत देत ‘अमळनेरच्या प्रताप तत्वज्ञान मंदिरात प्राध्यापक म्हणून तुझ्यासाठी जागा आहे.’ असे सांगितले. तेव्हा शास्त्रीबुवांनी तिथे जाऊन अर्ज केला. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी मुलाखत घेतली अन् त्यांची प्राध्यापक म्हणून नियुक्त केली. सर्वपल्ली राधाकृष्णन, साने गुरुजी, गुरुदेव रानडे अशा ज्ञानी महंतांच्या सानिध्यात शास्त्रीजी संस्कृतचे अध्यापन करू लागले. पुढे कोणत्यातरी कारणाने ते तत्वज्ञान मंदिर बंद पडले अन् शास्त्रीजींना अमळनेर सोडावे लागले. तद्नंतर भागवतावर प्रवचने देत त्यांनी महाराष्ट्रभूमी पाहिली. काही काळ वाईत त्यांचा मुक्काम झाला. मात्र पुढे स्वाध्याय परिवाराचे पांडुरंगशास्त्री आठवले यांनी ठाण्यात तत्वज्ञान विद्यापीठ सुरू केले होते. जेरे शास्त्रीजी तिथे अध्यापनासाठी गेले. अन् विद्यार्थ्यांना तत्वज्ञान व संस्कृतसारखे अबोध विषय सुसंबोधित करू लागले. त्यावेळी एक पंचविशीतला तरुण ठाण्यात एम.ए. तत्वज्ञान शिकण्यासाठी आला होता. गोरेपान, उंचपुऱ्या आणि जणू तेजोनिधीचेच रूप घेतलेल्या जेरे शास्त्रींकडे पाहून त्या तरुण विद्यार्थ्याच्या मनात आदर उत्पन्न होई. शास्त्रीबुवांच्या अमोघ वाणीने त्याचे मन प्रफुल्लित होऊन जाई. मात्र हा एम.ए. शिकणारा तरुण विचारांनी अगदी बंडखोर वृत्तीचा. देवाच्या अस्तित्वावरच प्रश्न करणारा कट्टर नास्तिकच! देव आहे की नाही? असेल तर तो दिसत का नाही? अशा एक ना अनेक द्विधांनी त्याची मन:वस्था अस्थायी झाली होती. या प्रश्नांची उत्तरं त्याला शोधायची होती. देवाच्या खऱ्या अस्तित्वाला जाणायचे होते. मात्र आजपर्यंत त्याला कुणी काही सांगितलच नव्हतं. याच काळात जेरेशास्त्रींच्या संपर्कात आल्याने त्याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. हे सत्पुरुषच आपल्याला खरा मार्ग दाखवू शकतील, असा दृढ विश्वास त्याच्या मनात उत्पन्न झाला. अन् शास्त्रीबुवां सोबत त्याची वेदांतचर्चा घडू लागली. परमेश्वराला अनुभवायचे खरे निधान कोणते? याचे निरूपणच शास्त्रीबुवा त्याच्यासमोर करत. मात्र तरीही त्या तरुणाला समाधानाची अवस्था काही मिळत नव्हती. शेवटी शास्त्रीजींनी त्याला उपदेश करत दत्तमहात्म्य या ग्रंथाची पोथी दिली आणि तीन वेळा या पोथीची पारायणे कर, असे सांगितले. अन् त्या तरुणाने तसे केले. दत्तमहात्म्य वाचल्यानंतर परमेश्वरापर्यंत पोहोचण्याची त्याची अभिलाषा तृप्त झाली. पूर्णत: नास्तिक असणारा हा तरुण जणू भक्तीप्रवाही न्हावू लागला. शास्त्रीबुवांनी दिलेला उपदेश फळाला आला. किशोर व्यास हे या तरुणाचे नाव. अहमदनगर जिल्ह्यातल्या बेलापूरसारख्या छोट्या खेड्यात राहणारा. पुढे या तरुणाची ईश्वराचे ब्रह्मसत्य जाणून घेण्याची इच्छा इतकी तीव्र झाली की, काशीला जाऊन त्याने संन्यस्तधर्म धारण केला. अन् त्यांचे नामाभिधान झाले स्वामी श्री गोविंददेव गिरी महाराज! गेल्या डिसेंबर महिन्यात दगडूशेठ गणपती ट्रस्टच्या दत्त मंदिरात प्रवचनासाठी गोविंददेव गिरी महाराज आले होते. त्यावेळी जेरेशास्त्रींचा आवर्जून त्यांनी उल्लेख केला. “शास्त्रीजींचे व्यक्तिमत्त्व बहिस्थ जितके तेजस्वी तितकेच अंत:स्थ तेजस्वी होते. ‘झाला महार पंढरीनाथ..’ हे गीत ऐकताना शास्त्रीजी ढसाढसा रडल्याचे मी प्रत्यक्ष पाहिले आहे.” असे ते म्हणाले. हेच गोविन्ददेवजी गिरी महाराज म्हणजे अयोध्येच्या श्रीराम जन्मभूमि न्यासाचे कोषाध्यक्ष! देशभरात श्रीराम समर्पणाच्या माध्यमातून सुमारे ४००० कोटी रुपये इतके निधीसंकलन त्यांनी आजपर्यंत केले आहे. हिंदूंच्या अस्मितेचे प्रतीक असलेल्या राम जन्मभूमीवर इतके भव्य मंदिर उभे राहतेय, यामागे कोषाध्यक्ष म्हणून स्वामी गोविंददेव गिरींचा वाटा मोठा आहे. ब्रह्मर्षी आत्मारामशास्त्री जेरेंच्या अनुग्रहाने गिरी महाराजांना परतत्त्वाची दिशा मिळाली. एकाप्रकारे जेरेशास्त्रींनी राम मंदिराच्या उभारणीत शिष्यदान दिले, असे म्हटले तर वावगे ठरू नये. दत्तभूमी नृसिंहवाडी ते रामभूमी अयोध्या असा भक्तीसेतू पं. आत्मारामशास्त्री जेरे आणि स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांच्या रूपाने आज फलद्रूप झाला आहे. जेव्हा प्रभू श्रीरामचंद्रांची प्राणप्रतिष्ठापना होताना स्वामी गोविंददेव गिरी तिथे उपस्थित असतील तेव्हा अदृश्य रूपाने तिथे ब्रह्मर्षी पं. आत्मारामशास्त्री जेरेसुद्धा असतील! ईश्वरीय संकेतांचे पूर्वसंदर्भ हे नियतीने आधीच ठरवलेले असतात. ‘दत्तमहात्म्य तीनवेळा वाचा’ हे शास्त्रीजींचे‌ बोल गोविंददेव गिरी महाराजांच्या जीवनात बदल करणारे ठरले. मग माझ्यासारख्या १८ वर्षांच्या मुमुक्षाला ग्रेसांच्या ओळींचा अर्थ इथे उलगडला…

तो बोल मंद हळवासा आयुष्य स्पर्शूनी गेला..

सीतेच्या वनवासातील जणू अंगी राघवशेला!

© श्री दर्शन रमेश वडेर

नृसिंहवाडी

मो. नं. 8459166409

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आज्जीचा राम vs. नाऊ ट्रेण्डींग राम – लेखिका : सुश्री सुखदा भावे-केळकर ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? विविधा ?

आज्जीचा राम vs. नाऊ ट्रेण्डींग राम – लेखिका : सुश्री सुखदा भावे-केळकर ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित 

राम मला माहीत झाला तो जयश्री आजीमुळे… राम तिचा सखा होता. आजी होती तेव्हा मी लहान होते त्यामुळे-  “काहीही झालं, अडलं तरी ‘ राम‘ म्हणायचं आणि पुढे जायचं” म्हणजे काय हे तेव्हा मला समजायचं नाही. मोठी होत गेले तशी आजीचं हे वाक्य समजत गेलं की राम म्हणजे विश्वास ठेवण्याची कुवत,  अडलो थकलो तर विश्रांती घेण्याची पण प्रयत्न न थांबवण्याची नियत, राम नाम म्हणजे थेरपी… प्रॉब्लेम वरून लक्ष डायवर्ट करून सोल्युशन वर केंद्रित करण्यासाठीची!

खरंच आजीचा तरुणपणीचा काळ पहिला तर…

तिचे वडील शिक्षक असल्याने आजीला पुरेशी स्वप्न त्यांनी दिली… शिकण्याची, स्वाभिमानाची… पण मुलीच्या स्वप्नांना पूर्ण करणं त्याकाळी प्रायोरिटी वर नसायचं…चार मुलीत मोठी असलेल्या तीचं काळानुरूप लग्न झालं. सगळी माणसं, मुलं,घर सांभाळण्यात कितीदा तिच्या इच्छा आकांक्षा ना दुय्यम राखलं गेलं असणार. त्याकाळी इंटरनेट द्वारा जग खुलं झालेलं नव्हतं मात्र लायब्ररीत जाऊन पुस्तक आणून ते सवडीनं वाचावं अशी तिची इच्छाही कितीदा पूर्ण करायची राहून जायची. अशा सगळ्या खटाटोपात तिला पोझिटिव ठेवणारा तिचा राम होता.  त्या काळी नवरा नवराच असे मित्र नसायचा! कौन्सेलिंग नव्हतं, मंडला आर्ट नव्हती, ऑनलाईन योगा झुंबा क्लास नव्हते, म्यानियाक शॉपर्स साठी मॉल्स नव्हते, किटि पार्टीज साठी खेळते पैसे नव्हते,  फेमिनिझम चे वारे नव्हते. अशा वेळी जीवनातलं मळभ हटवून प्रकाशाकडे नेणारा तिचा सखा “राम” होता.

आपल्याकडे लहान मुलांना आपण खंबीर होण्याऐवजी घाबरायलाच शिकवतो लहानपणापासून… अभ्यास केला नाहीस तर काहीच मिळणार नाही पुढे, मस्ती केलीस तर बुवा येईल! पण “जा ग सोने… तुला वाटतंय ना हे करावं? तू सातत्याने प्रयत्न करत रहा, राम आहेच बरोबर”असं सांगणारी माझी आजी होती. त्यामुळे घाबरायपेक्षा हिमतीनं पुढे जायला शिकले. तिनी माझ्यात राम बिंबवला. माझ्या मनात राम मंदिर बांधलं तिनं!

22 जानेवारीला राम मंदिर सोहळा आहे. सध्या राम खरंच सगळीकडे ट्रेण्डींग आहे! रामाच्या अक्षता, रामाचा शेला, राम मंदिराची घरी ठेवण्यासाठी प्रतिकृती!! पॉलिटिकल इंटरेस्ट आणि काहींच्या वेस्टेड इंटरेस्ट च्या दृष्टीनं हे बरोबर आहे. एखादी गोष्ट, काम सांघिक भावनेने पुढे नेणे आणि त्याचा सोहळा करणेही गैर काहीच नाही! पण राम साजरा करणे म्हणजे फक्त लाईटींग आणि दिवे लाऊन स्वतःच घर उजळणे नाही… तर स्वतः मधला प्रकाश जागृत ठेवून ज्याच्या कडे कमी उजेड आहे त्याच्यासाठी ज्योत होणे.

माझा राम, ट्रेण्ड बदलला की आउटडेटेड होणारा नाही… तर पुढच्या काळासाठी मला सतत अपडेट करणारा आहे! मला अशी आजी मिळाली की जिने मला खरा राम समजावला… तोच मला तुमच्याही लक्षात आणून द्यावा वाटतोय…

राम म्हणजे संकल्प, राम म्हणजे मनोनिग्रह. निगेटिव्ह वर पॅाझिटिवची मात म्हणजे राम. अगदी आळस झटकून साधं छोटं पाहिलं पाऊल उचलणं म्हणजे राम. तो मनी ठेवूया.. कायमसाठी! अन्यथा आल्या ट्रेण्ड नुसार एक दिवस स्टेटस वा रील लावणं ह्यात काही ‘ राम‘ नाही बरं!!

लेखिका : सुश्री सुखदा भावे- केळकर

प्रस्तुती : सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “नाते जुळले…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “नाते जुळले…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट

आपल्याकडे सहसा नातं म्हणजे जन्मापासून रक्ताचं असलेलं वा विवाहानंतर जोडल्या गेलेलं. ह्या संकल्पनेवरच आधारित नाती टिकतात, तीच योग्य असतात ही आपली संस्कृती शिकविते. परंतु विदेशात मात्र ह्या नात्यांइतकच किंबहुना मनाचे मनाशी जुळलेले नातं, पटणारे विचार ह्याला जास्त प्राधान्य दिलं जातं. आपल्या संस्कृतीत वर उल्लेखल्या प्रमाणे आपल्याकडे असणाऱ्या  नात्यांना मान्यता असते.परंतु विदेशात मात्र तसं नसतं तिकडे अजून एक नात ह्या नात्याइतकचं किंबहुना जरा काकणंभरं जास्त सुद्धा  जपल्या जातं, मानल्या जातं. हा भिन्न संस्कृती मधील विचारांचा फरक आहे. अर्थातच प्रत्येकाला आपापले विचार, आपापलं वागणं,आपापली संस्कृती हीच योग्य असं वाटत असते. प्रत्येक भिन्न टोकांच्या गोष्टींमध्ये काही प्लस आणि काही मायनस पाँईंट हे असतातच.

ह्या नात्यांच्या गुंफणीवरुंन मला एक मस्त गोष्ट वाचलेली आठवली. अर्थात गोष्ट आहे विदेशातील. तिकडच्या वहिवाटीप्रमाणे अनोख्या नात्यांमधील एका महत्वाच्या नात्यांनी जोडल्या गेलेली एक जोडगोळी “लव्ह इन रिलेशनशीप” मध्ये एकत्र राहात असते. अर्थातच हा निर्णय घेतांना त्यांचे पटणारे विचार त्यांच्या जुळणा-या आवडी ह्यांना विशेष प्राधान्य देऊन एकमेकांवर भरपूर प्रेम करीत पण एकमेकांची स्पेसही तितकीच महत्वाची हे ओळखून ही जोडगोळी आपल्याच विश्वात दंग होऊन एकत्र गुण्यागोविंदाने, प्रेमानं राहातं होती,आपल्या भाषेत नांदत होती.  ह्यामध्ये  अजून एक गोष्ट सामावली होती,किंबहुना ती गोष्ट होती म्हणूनच ते एकत्र आले होते,राहात होते,ती गोष्ट म्हणजे प्रत्येक बाबतीत परस्परांवर असलेला दृढ विश्वास. हा दृढ विश्वासच त्यांना

त्यांच्या प्रेमाची खात्री पटवून देत होता. दृढ विश्वास ठेवणे आणि अपेक्षांचा अतिरेक न करणे ह्या दोन्ही गोष्टी दोन्हीही कडून काटेकोरपणे पाळल्या मात्र जायलाच हव्यात.

प्रत्येकाच्या जीवनात चढउतार हे असतातच. सगळे दिवस हे सारखे न जाता त्यात विवीधता सामावलेली असते.अर्थात असं असतं म्हणूनच हे जीवनं निरस,सपक न वाटता छान जगण्याची ओढ वाटतं असलेलं आणि आव्हानात्मक हवहवसं वाटतं. ह्या जोडगोळी मधील त्या दोघांची नाव तो “जीम”आणि  ती “मेरी”.

तर जीम आणि मेरी ह्यांची आपापली कामं ,आपापल्या नोक-या ह्या सूरू असतांना त्यात अडचणी पण असतातच परंतु त्यातून मार्ग काढीत ही मंडळी आपल्याला हवा तसा आनंद मिळवत असतं,तो मनापासून स्विकारुन जीवन आनंदात घालवतं होते. नोकरी सुरू असतांना वाढत्या महागाई मुळं जीमला त्याची कमाई ही अपुरी पडायला लागली. नोक-या, महागाई, संकटांना तोंड देणं,त्यातून मार्ग काढणं ह्या गोष्टी तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही राहा ,ह्या  अटळच. जीम ठरवितो आज काहीही झालं तरी पगारवाढीबद्दल बोलायचचं. त्यामुळे

तो जरा सकाळपासूनच नर्व्हस असतो,ही मनातली घालमेलं मेरी ने ओळखलेली असते, नजरेनं सुद्धा टिपलेली असते. ती निघतांना काहीही न बोलता फक्त जीमच्या हातावर थोपटून त्याला दिलासा देते.काय नसतं त्या स्पर्शात, तो स्पर्श असतो भक्कम पाठिंब्याचा, काहीही झालं तरी टिकणा-या दमदार साथसंगतीचा.

बरेचदा आपण एखाद्या गोष्टीचा बाऊ करतो,टेंशन घेतो पण ती  समस्या कधीकधी अनपेक्षितरित्या चुटकीसरशी सुटते.जीमने बाँसला पगारवाढीबद्दल बोलल्यावर बाँस ने जीमचं जीवतोडून कामं करणं आणि वाढती महागाई ओळखून त्याचा पगार जीमच्या अपेक्षेनुसार कुठलीही खळखळ न करता वाढवून दिला. मोठ्या आनंदाने जीम घरी जायला निघाला. त्याच्या येण्याच्या वेळी मेरी जेवणाची जय्यत तयारी करून ठेवते.आज सगळा मेन्यु साग्रसंगीत त्याला आवडणारा करते,त्याला जसं हवं असतं तसं प्रफुल्लित वातावरण तो घरी यायच्या वेळी तयार करते.ती पण तशी टेन्स मध्येच असते आज बाँस जीमला काय म्हणतोय ह्या विचारांनी.पण बेल वाजल्यानंतर मात्र ती आपला चेहऱ्यावरील ताण काढून टाकून प्रसन्न, हसतमुख मुद्रेने जीमचं स्वागत करते. जीम ची मनस्थिती आधीच प्रफुल्लित असतेच आणि आता ह्या विशेष आवडणा-या वातावरण निर्मीतीमुळे तो जास्त आनंदित होतो.मेरी त्याला टेबलवर सगळं त्याच्या आवडीचं सर्व्ह करते आणि मग टेबलवर त्याच्यासाठी स्वतः लिहीलेली चिठ्ठी ठेवते. जणू ती चिठ्ठी त्याची वाटच बघत असते. त्या चिठ्ठीत लिहीलं असत़ं,” मला खात्री होतीच हे यश तुला मिळणारचं .तुझं अभिनंदन आणि हो मी कायम तुझ्याबरोबर आहे.” त्याला खूप आश्चर्य वाटतं मेरीला पगारवाढीबद्दल आधीच कसं काय कळलं?

तो ह्या विचारात असतांना मेरी डेझर्ट आणण्यासाठी आत जातांना तिच्या गाऊन मधील खिशातून दुसरी चिठ्ठी पडते.ती चिठ्ठी उचलून जीम ती वाचतो आणि अतीव प्रेमाने त्याच्या डोळ्यात पाणी तरळतं. त्या दुसऱ्या चिठ्ठीत लिहीलं असतं “जीम काळजी करु नकोस,एकवाट बंद झाली तरी दुसऱ्या नवीन वाटा उघडतात, आपण ह्यातुनही मार्ग हा काढूच,मी कायम तुझ्याबरोबर आहे.” म्हणजेच काय तर मेरी ही कुठल्याही परिस्थीतीत त्याच्या बरोबरच असणार होती.आणि हा दिलासा, विश्वास आयुष्यभरासाठी पुरून उरतो.

खरचं कुठल्याही नात्याचं असं घट्ट बाँडींग असेल नं तर ते नातं तकलादू न राहाता त्याचा पाया हा भक्कमच राहात़ो. एक नक्की समजलं नातं हे कुठलही,कोणतही असो,सख्खं असो वा बंधनातून जुळलेलं त्याचा पाया हा खूप महत्वाचा.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ — शुद्धलेखन व शुद्ध बोलणे… ☆ सुश्री प्रज्ञा मिरासदार ☆

सुश्री प्रज्ञा मिरासदार

? विविधा ? 

☆ — शुद्धलेखन व शुद्ध बोलणे… ☆ सुश्री प्रज्ञा मिरासदार

मागच्या आठवड्यात व्हाट्सअप वर एका लेखिकेची पोस्ट वाचली. तिने बोलीभाषा, प्रमाणभाषा, शुद्ध भाषा याविषयी विचार मांडले होते. त्याविषयी लिहिताना लेखिका म्हणते की,एका साहित्य संमेलनात अनेक जण बोलताना अशुद्ध उच्चार करत होते.( मी ग्रामीण अशुद्ध भाषेविषयी सांगत नाही).

तर ही मराठी साहित्य संमेलनातील भाषा आहे. ती शुद्ध मराठी असावी अशी साहजिकच अपेक्षा असते. पण तिथे न आणि ण यातील उच्चारांची गल्लत केली जात होती. उदा.- अनुभव न म्हणता अणुभव म्हणणे,मन ला मण म्हणणे वगैरे . मराठी साहित्य संमेलना सारख्या ठिकाणी या चुका अक्षम्य मानल्या जायला पाहिजेत.

दर 20 कोसांवर भाषेची बोलण्याची लकब, ढब, लहेजा बदलला जातो ही खरी गोष्ट आहे. पण ण आणि न ही मुळाक्षरे असून त्यांच्या उच्चारात बदल होता कामा नये. ज्यांनी साहित्याचा, भाषेचा अभ्यास केला आहे, त्यांनाच साहित्य संमेलनात भाषण करण्याचा मान मिळतो. किमान त्यांच्याकडून तरी शुद्ध बोलण्याची न ला ण किंवा ण ला न म्हणण्याची अपेक्षा असणारच. न  ण बदल केल्यामुळे काही वेळा अर्थही बदलतो.

जर साहित्य संमेलनात भाषण करणारी व्यक्ती अशुद्ध बोलत असेल तर त्याचे कारण ती व्यक्ती लहानपणापासूनच तसे बोलत असणार. तेच वळण त्यांच्या जिभेला लागलेले असणार. पण साहित्याचा अभ्यास करताना प्रयत्नपूर्वक ते वळण बदलण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला नसावा.

मी सुद्धा एका शहरात पाच वर्षे राहिले तिथे भाषेचे उच्चार बऱ्याच प्रमाणात अशुद्ध असत. उदा. –  “ती यायला लागली होती”. या ऐवजी “ती यायली होती” असे म्हटले जाते. शिकले सवरलेले लोक, कॉलेजमध्ये शिकवणारे प्राध्यापकही असेच बोलत. (अजूनही असेच बोलतात). तेव्हा खरंच आश्चर्य वाटते. माझा धाकटा मुलगा तिथे असताना खूप लहान होता. तिथेच बोलायला शिकला. आजूबाजूच्या भाषेचा त्याच्या बोलण्यावर खूपच प्रभाव होता. नंतर आम्ही आमच्या मूळ गावी आलो तेव्हा काही वर्षांनी त्याच्या बोलण्याची ढब बदलली.

हे झाले बोलण्याविषयी ! पण लिहिणे सुद्धा किती अशुद्ध असावे याला काही सुमारच नसतो. वेलांटी, उकार यांच्या चुका लिखाणात खूप सापडतात. त्यानेही अर्थ फारच बदलतो. उदा.- तिने हा शब्द तीने, तीन, तीनं असा लिहिलेला अनेक वेळा वाचनात आलेला आहे. तो फार तर तिनं असा बरोबर आहे. पण या अनुस्वारांचीही चूक होतेच. नको तिथे तो दिला जातो. पाहिजे तिथे दिला जात नाही. “मी जाणारच नाही” या ऐवजी “मी जाणारंच नाही” किंवा “मी जाणारचं नाही” असं लिहिलं जातं. गंमत म्हणजे या “असं लिहिलं जातं” या वाक्या ऐवजी “अस लिहिल जात” असे वाक्य ही वाचण्यात येते. तिथे कुठेच  अनुस्वार  दिला  जात  नाही. पण तो  देणे आवश्यक असते.

बोलीभाषा बदलते म्हणून लिहिताना भाषा बदलायला नको. आपल्या भाषेचा आपल्याला अभिमानच असायला हवा. पण चुकीचे उच्चार करून, चुकीचे लिहून आपणच आपल्या भाषेचा अपमान करतो आणि हे बोलणाऱ्याच्या, लिहिणाऱ्याच्या लक्षातच येत नाही- ते यायला हवे.

मी एक पोस्ट वाचली त्यात एका रांगोळी प्रदर्शनाला येण्याचे आवाहन केले होते. त्या पोस्टमध्ये इतके चुकीचे शब्द लिहिले गेले होते की मला वाटले त्या बाईला वैयक्तिकरित्या मेसेज करावा आणि तिच्या चुका दाखवून द्याव्यात. “औचित्य” हा शब्द तिने “आवचित्त” असा लिहिला होता. “संपूर्ण” न लिहिता “संपुर्ण” , “पहायला” ऐवजी “पाहायला”,  “रांगोळी रुपात” लिहिताना तिने “रांगोळी रुपातंर”  असे लिहिले होते. “एकत्रित” ऐवजी “एकत्रीक”, “पाहण्याची” ऐवजी पाहन्याची, “प्रोत्साहन” न लिहिता “प्रोच्छाहन”,  “ठिकाण” ऐवजी “ठिकान”, आणि आर्टिस्ट ऐवजी “आर्टिष्ट” असे चुकीचे शब्द लिहिलेले होते.

हे सर्व वाचून मला कसेसेच झाले. आपला समाज भाषेच्या उच्चाराबाबत, लिखाणाबाबत इतका मागास असावा, यावर विश्वास बसत नाही.

हल्ली इंग्रजी बोलता येणे हे प्रतिष्ठेचे लक्षण मानले जाते. बोला ना! इंग्रजी मध्ये बोलणे, इंग्रजी येणे, तेही आवश्यक आहे. पण आपल्या भाषेबाबत ही सजगता का नाही दाखवली जात?

विचार करण्याजोगी ही गोष्ट आहे, हे नक्कीच ! यात काही जादू तर घडणार नाही, की जेणेकरून भाषेचे उच्चार व लिखाण सुधारेल. तरीही असे वाटते की शुद्ध मराठी भाषेचे पुनरुत्थान आवश्यकच आहे. ती शुद्धच लिहिली गेली पाहिजे. बोलताना प्रमाण भाषेचे भान ठेवून बोलली गेली पाहिजे.  निदान भाषण करताना तरी याचे भान असावे, ही किमान अपेक्षा आहे.

© सुश्री प्रज्ञा मिरासदार

पुणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ डोळस दसरा… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल 

? विविधा ?

डोळस दसरा…  ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

नऊ महिने नऊ दिवस पूर्ण झाले आणि डोळेझाक करता न येणार्‍या प्रसव वेदना तिला सुरू झाल्या.

डोळयाला डोळा लागत नव्हता . वेदनेने सुलोचना  डोळे घट्ट मिटत होती. अचानक तिच्या डोळ्यांपुढे काजवे पसरले, डोळ्यात पाणी तरळले ज्या क्षणाकडे ती डोळे लावून बसली होती तो क्षण आला आणि एका मोठ्या वेदनेच्या क्षणी ती प्रसूत झाली. वेदनेने तीचे डोळे बंद झाले. पण क्षणात टॅहॅ टॅहॅच्या आवाजाने तिने झटकन डोळे उघडले. जडावलेल्या डोळ्यातही मातृत्वाची वेगळी चमक दिसली आणि सुलोचनाने दसर्‍याच्या मुहूर्तावर जन्मलेल्या आपल्या परीला कुशीत घेत डोळे भरून पाहिले.

जणू शैलपुत्रीचे दर्शन तिला झाले होते. दसर्‍याच्या मुहूर्तावर जन्मली म्हणून तिचे नाव दुर्गा ठेवले.

डोळ्यात तेल घालून ती तिला जपत होती. जरासुद्धा डोळ्याआड तिला होऊ देत नव्हती. जणू काळजीचा तिसरा डोळाच तिला लागला होता. असे ब्रह्मचारिणीचे रूप तिचे १० वर्षाचे डोळ्याचे पाते लवते न लवते तोच संपले होते.

दुर्गा सगळ्य़ात हुषार होती.तिची हुषारी सगळ्यांच्या डोळ्यात येत होती. असे करता करता जणू ही चंद्रघंटा दहावीत प्रथम क्रमांकाने पास झाली होती. तेव्हा तिचे टपोरे डोळे अधिकच पाणीदार भासले होते. काहींच्या डोळ्यावर हे येत होते  डोळ्यात खुपत होते हे न कळायला तिने डोळ्यावर कातडे नव्हते ओढले.  पण ती त्याकडे काणा डोळा करायची.

दुर्गाची दहावी झाली आणि तिने मिल्ट्रीमधे जायचा हट्ट धरला. हे ऐकून सुलोचनाच्या डोळ्यांपुढे अंधेरीच आली .तिच्या डोळ्यातून गंगा जमुना वाहू लागल्या . पण मिल्ट्रीत जायचा निर्धार दुर्गेच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होता. ती दुसर्‍या गावी जाणार म्हणजे दोन डोळे शेजारी पण भेट नाही संसारी अशी अवस्था होणार होती. तरी तेव्हा कुष्मांडासारखी ती धैर्यशील भासत होती.

ट्रेनिंग घेत असतानाच एक मुलगा एका मुलीची छेड काढत असलेला तिच्या डोळ्यांनी पाहिले. डोळ्यात अंगार भरला तिने त्याला पकडला . डोळे वटारून तिने त्याला अपादमस्तक न्याहाळले. खाडकन त्याच्या मुस्कटात लगावून डोळे फडफडवून तिने त्याला समज दिली पुन्हा जर वाईट नजरेने मुलींकडे बघशील तर डोळे काढून गोट्या खेळीन मग तुझ्या डोळ्याच्या खाचा होतील.  त्याच्या डोळ्यात मूर्तीमंत भिती दाटली .डोळे पांढरे झाले. माफी मागून त्याने कशीबशी स्वत:ची सुटका करून घेतली. तिचे ते रूप स्कंदमातेप्रमाणे करारी तरीही क्षमाशील भासले.

हे तिचे रूप शिवाच्या डोळ्यात भरले. ज्या डोळ्यात धाक होता त्याच डोळ्यांना डोळा भिडवला .तिने डोळे आले आहेत या बहाण्याचेही काही चालले  नाही. वेगळा भाव त्यामधे दाटताच तिला डोळा मारला. तिच्या पाणीदार डोळ्यांकडे तो डोळे रोखून पाहू लागला. तिला डोळे फिरवणे शक्यच नाही झाले. क्षणात तिने डोळे झुकवले.  हे तिचे रूप त्याला कांत्यायनी सारखे भासले.

अर्थातच डोळ्यात धूळ फेकणे कोणाला शक्यच नव्हते. डोळ्यात डोळे घालणे चालूच होते. ती मिल्ट्रीमधे रुजू झाली. तो पण कॅप्टन पदावर होता. तरीही दुर्गा त्याला पहाताच नकळत डोळे मोडीत चालायची. दुर्गाला चांगली नोकरी लागावी हे स्वप्न असतानाच चांगला जोडीदार मिळाला पाहून आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे याचा प्रत्यय आला होता.  घरच्यांनी त्यांचा शानदार विवाह लावून दिला. असा सोहळा पाहून डोळ्याचे पारणे फिटले . कौतूक आनंद कोणाच्याच डोळ्यात मावत नव्हते. हे रूप सगळ्यांनाच  महागौरीचे वाटले.

लग्नानंतर तिने तिचे काम चालूच ठेवले होते. अनेक नराधमांचे लागलेले डोळे उखडले होते. त्यांना समज देऊन डोळे उघडले होते. उघड्या डोळ्यांनी जग बघायला शिकवून  डोळे असून आंधळ्यासारखे राहू नये शिकवताना डोळ्यात अंजन घातले होते. हे तिचे रूप कालरात्रीचे भासले.

नंतर मात्र अचानक तिच्या जीवनात एक दुर्घटना घडली. तिच्या सासर्‍यांच्या डोळ्यात फुल पडले . डॉक्टरही कधी कधी डोळ्यात कचरा कानात फुंकर सारखी ट्रिटमेंट देतात याचा अनुभव आला. त्या नादात सासर्‍यांचे डोळे फुटले होते. त्यांचे डोळे निर्विकार झाले होते. तिचे प्रथम कर्तव्य  सासर्‍यांची सेवा करणे असल्याने तिने राजीनामा दिला होता. तिच्या डोळ्यांचा पहारा कायम ती देत होती.

अशातच तिच्या पण तब्येतीच्या तक्रारी सुरू झाल्या आणि चाचणीअंती समजले की तिला आतड्याचा कॅन्सर आहे आणि ती काही दिवसांचीच पाहुणी आहे.  ती दिसायला चांगली होती पण आतून तब्येत बिघडली हे पाहून डोळे व कान यात चार बोटांचे  अंतर असते  हे पटले होते. सासर्‍यांच्या डोळ्यात पडलेल्या फूलाचे कुसळ तिला दिसले होते पण स्वत:च्या डोळ्यात म्ह्मणजे तब्येतीत घुसलेले मुसळ तिला दिसले नव्हते.

सगळ्यांच्याच डोळ्यांपुढे आता पुढे काय हे प्रश्नचिन्ह उभे होते. तर दुर्गेला तिच्या सासर्‍यांबद्दल डोळा हेकणा किधर भी देखणा असे कोणी म्हणू नये असे वाटल्याने डॉक्टर आणि शिवाला सांगून नेत्रदान करण्याचा व डोळे सासर्‍यांना बसवण्याचा निर्धार सांगितला. ती खूप थकली होती. तिचे डोळे किलकिले होत होते. ती मुश्किलीने डोळे उघडे ठेवण्याचा प्रयत्न करीत होती पण तिला ते जमत नव्हते. तिचा डोळा लागला आहे असे वाटत असतानाच तिचे डोळे निवले आहेत आणि तिने कायमचे डोळे मिटले असल्याचे डॉक्टरने सांगितले.

लगबगीने डोळ्यांच्या डॉक्टरांनी तिचे डोळे काढून एक तिच्या सासर्‍यांना आणि एक गरजूला बसवला होता. दोन्ही ऑपरेशनस् यशस्वी झाली होती. आता ती डोळ्यांच्या रुपाने या दुनीयेत शिल्लक होती. तशातही तिचे रूप सिद्धीदात्रीचे भासले

शिवाला तिच्या कार्याचा फार अभिमान होता. आज दसरा होता आणि दुर्गेचा वाढदिवस , प्रथम स्मृतीदिन होता. त्याने दवाखान्यात जाऊन नेत्रदानच नाही तर देहदानाचा फॉर्म भरला होता. खर्‍या अर्थाने एक डोळस दसरा आज साजरा केल्याचे समाधान त्याच्या डोळ्यातून ओसंडत होते.

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मकर संक्रांत विशेष – बोला… अमृत बोला! ☆ श्री श्रीनिवास  गोडसे ☆

श्री श्रीनिवास गोडसे

अल्प-परिचय

जन्म – ६ जून १९६८

शिक्षण – बी कॉम, व्यंकटेश महाविद्यालय, इचलकरंजी,

विशेष – वाचनाची व लेखनाची आवड, काही लेख प्रसिद्ध, -चांदोबा ते कैवल्याच्या चांदण्याला ह्या लेखाचे कोल्हापूर आकाशवाणी वर वाचन, सोशल मीडियावर अनेक लेख प्रसिद्ध.

? विविधा ?

☆ मकर संक्रांत विशेष – बोला… अमृत बोला! ☆ श्री श्रीनिवास गोडसे ☆

“अरे मुडद्या तिकडं उन्हात का मरालायस इकडे सावलीत येउन मरकी की काय मरायचं तेे.. आँ..ss!”

उन्हात खेळणाऱ्या चार वर्षाच्या बंड्यावर चंपा ओरडली… पोरगं धाकाने उठून जवळ आलं. तसा आईच्या काळजाचा धपाटा चंपानं त्याच्या पाठीत घातला.. बंड्याच्या पाठीला काय पण फरक पडला नाही.. अर्धा खाल्लेला उष्टा रव्याचा लाडू बंड्यानं निरागस हसून आईसमोर धरला.. अन हसून चंपानं त्याला जवळ धरले…चिमणीच्या दाताने लाडू चा तुकडा मोडून चंपानं प्रेमानं छोट्या बंड्याचा मुका घेतला.. एक मिनिट मिनिटापूर्वी आलेला राग कुणाचं काय पण बिघडू शकला नाही…

 सुन्या आणि अन्याच्यात काय तरी कारणानं जोरदार भांडण जुंपले बोलणारा सुनील अनिलवर सक्त नाराज होऊन ओरडला

 “आयुष्यात परत लक्षात ठेवा  अनिलराव परत तुमच्या नादाला लागणार नाही”

सुनील च्या त्या वाक्याने अनिल चा काळजाचा तुकडाच निघाला… नेहमीच्या आपुलकीचा एकेरी पणा आज आपण कुठेतरी हरवून बसलो याची मनापासून जाणीव होताच अनिल च्या आवाज बंद झाला… अन्यावरून डायरेक्ट “अनिलराव” हे सुनीलचे हाक मारणे अनिलच्या काळजावर वार करून गेलं. दोन मिनिटे शांततेत गेली अनिल चा स्वरच पालटला

“असं काय करतोस सुन्या मर्दा ऐक की माझं जरा!’  अशी समजूतची भाषा अनिलनं काढली  अन भांडणाचा नूरच पालटला… आणि पुढच्या पंधरा-वीस मिनिटात सगळा “मॅटर क्लिअर” झाला… भाषा बदलली… नूर बदलला… गैरसमज संपले… तासाभरानं चहाच्या टपरीवर एक पेशल “च्या” दोघात संपला..

“संजुबाळ ss धीरेssधीरेss” शाळेत उशीर होत असलेल्या संजीव ची आई संजुवर चिडली होती. आईचे हे “गोड” कुत्सित बोलणे ऐकले अन आता आपली काय खैर नाही याची जाणीव संजूला झाली.. आता गोड आवाजाचा अर्थ काय होणार हे त्याला अनुभवाने माहिती होते कसं बसं पटापटा आटोपून संजीव मात्र दप्तर घेऊन शाळेच्या वाटेला पळत सुटला…

थंडीने काकडणारा राजू झोपेतुन उठून तसाच मोरीत पळाला. तोंड धुतले, आईने गरम पाणी बादली भरून दिले. गुडघ्यावर बसून राजू डोक्यावर तांब्याने पाणी ओतू लागला. निम्मी बादली संपली… बाबा आले राजूला उभे केले… त्यांच्या लक्षात आले की गुडघ्याची मागची बाजू कोरडीच आहे… आळशी राजू चा बाबांना राग आला दोन रट्टे पिंढरीवर मारुन रडणाऱ्या राजुला बाबांनी चांगली घासुन आंघोळ घातली… ‘काही न बोलता’..! बाबांची शिस्त मात्र राजूने आयुष्यभर लक्षात ठेवली…

आनंदरावांचा ड्रेस शिवायला घेतलेल्या शामभाऊ टेलरकडे आनंदरावांच्या एव्हाना दहा चकरा झाल्या होत्या. प्रत्येक वेळा आनंदराव गोड बोलून विचारायचे, श्यामभाऊ मात्र रोज वेगळे कारण सांगायचा… मुदत मागायचा. आज मात्र आनंदराव चिडले. श्याम भाऊ टेलरची चांगली खरडपट्टी काढली. मोठा आवाज काढून भांडणाऱ्या आनंदरावांच्या व शामभाऊ च्या भोवती चांगली दहा पंधरा माणसे गोळा झाली…  संध्याकाळ पर्यंत शर्ट शिवून दे नाही तर माझ्याशी गाठ आहे असे म्हणून आनंदराव परतले… श्यामभाऊ चांगलाच हादरला होता… सायंकाळी पूर्ण काम करूनच श्यामभाऊने आनंदरावांच्या शर्ट घरपोच केला होता…

तिळगुळ घ्या गोड बोला सांगणारा हा संक्रांत सण पण कधीकधी गोड बोलून कामे होत नाहीत तेव्हा मात्र असं आनंदरावांसारखे तिखट बोलता आलं पाहिजे.

गोड या शब्दाचा असा प्रत्येकासाठी वेगळा वेगळा अर्थ लागतो. आपण सगळेच जण विचार करू तर एका निष्कर्षापर्यंत जरूर पोहोचू की गोड ही कल्पना वेगवेगळ्या संदर्भाने येऊ शकते.. कोणी असे म्हणेल की आमच्या ‘हिच्या’ हातच्या स्वयंपाकाची गोडी जगात कशालाच नाही.

याचा अर्थ जे काही ‘ही’ करते ते उत्कृष्ट असते. मग लसूण मिरच्या घालून केलेला चमचमीत खर्डा पण गोड होऊन जातो.

आपल्या मनात प्रेम असेल तर एखाद्या व्यक्तीच्या शिव्या पण गोड वाटतात. कारण ते देणाऱ्या आणि घेणाऱ्या दोघांचा ‘बंध’ मनापासून असतो. मग कुणी आदरार्थी बोलले तरी दूर करणारे ठरते. आणि कोणी एकेरी बोलले तरी दूर ढकलल्यासारखे वाटते…

हे मनातले अंतर मोठे विचित्र आहे. मग हजारो किलोमीटर असलेला पण ऱ्हदया जवळ राहतो आणि रोज घरात राहणारा मात्र टप्प्यात येत नाही.

गोड बोलणे किती तिखटजाळ होते तेव्हा ते बोलण्यामागे असलेला ‘भाव’ कुत्सितपणाचा असतो.

मग आईने घातलेल्या शिव्या पण ‘लागत’ नाहीत पण गोड बोलणे ‘लागते’… त्यामुळे हा ‘भाव’ फार महत्त्वाचा … तो प्रेमाचा असेल तर मग वरकरणी कसेही बोला जीवनात ‘गोडीच’ राहील…

पुराणकथेत शनि विचारतो की तुझ्या शरीरात मला बसण्यासाठी जागा दे तेव्हा त्याला उत्तर दिले जाते की माझी जीभ सोडून कुठेही बस… शनी हताश होतो म्हणतो तू जर माझी गादीच काढून घेतलीस.. आता मी तुझ्या शरीरात कुठे बसू शकत नाही… शनि पार पळून जातो..

दिवस कसेही असो शनीला जिभेवर स्थान न देणे शहाणपणाचे.

गुरुचरित्रात एक कथा येते की कली देवाच्या दरबारात प्रवेश करतो तो एका हातात वासना आणि एका हातात जीभ घेऊनच… त्याला विचारले जाते की “असे का रे..?” तेव्हा कली उद्गारतो. माझ्या या युगात मी या दोनच गोष्टी मध्ये वाईट रूपाने असेन. जो कोणी आपल्या जीभेवर आणि वासनांवर ताबा मिळवेल त्यांचे मी काहीही बिघडवू शकणार नाही .

मनात उमटणाऱ्या भावना व्यक्त करण्यासाठी मानवाने भाषेचा आधार घेतला. अनेक भावभावनांना , पदार्थांना काही विशिष्ट उच्चार मिळाले आणि भाषा प्रगत झाली. भाषांनी मानवाचे जगणे सुलभ केले. संदेशवहन सोपे झाले. जन्मापासून आपल्याला या भाषेची मोहिनी घातली जाते. आपल्याला काय वाटते ती प्रत्येक गोष्ट एक बाळ आपल्या उच्चाराने आईला, समाजाला कळवते. त्याच्या गरजा पूर्ण होतात. भाषेची थोरवी खूप मोठी… निशब्द शांत बसलेले असताना पण आपण आपल्याशी असा मातृभाषेतून संवाद साधत असतो… आपल्या विचारांना सुव्यवस्थित मांडत असतो… म्हणजेच निशब्दातही आपले शब्द शांत राहात नाहीत… प्रकट होत राहतात… हे प्रकट होणे खरंतर चमत्कारापेक्षा कमी नाही… अचानक काही विचार मनात उमटतो… खरंतर तो कोठून येतो हे कळतच नाही… निसर्गच ते पुरवत असतो… हा पलीकडून बोलणारा कोण? याचा शोध अनेक संतांनी घेतला… कोsहम् कोsहम् विचारत राहिले… सोsहम सोsहम म्हणत राहिले… तोच ओंकार… आणि तोच आदी… तोच अंत…

 संक्रांतीचा गोड बोला संदेश इतक्या अमृतवाणी रूपाने आपण स्वीकारला तर जीवन धन्य होईल.

वाणीचे चार प्रकार सांगितले आहेत

 वैखरी: जी आपण व्यवहारात बोलतो ती मुखात जन्मते,

मध्यमा: तिच्या मागे सामुदायिक कल्याण अपेक्षित असते अशी वाणी ऱ्हदयात उत्पन्न होते,

पश्चंती: ज्याच्या मध्ये आशीर्वाद किंवा सिद्धी असतात उत्पत्तिस्थान पोट असते आणि

 सर्वात उच्च वाणी – जिला परा म्हणतात… ती देववाणी मानली जातेे… तिथे ओंकार येतो… वेदवाणी येते…श्लोक, स्तोत्रे किंवा ईश्वरापर्यंत नेणारे शब्द हे या वाणीत येतात.. हि नाभित उमटते…

या अमृतवाणी साधनेची सुरुवात मात्र गोड बोलण्याने होते. प्रेमाने बोलण्याने होते…

म्हणून हे मकर संक्रमण महत्त्वाचे, आपणा सर्वांना या अमृतमय प्रवासास मनापासून शुभेच्छा…

बोला । अमृत बोला ।

शुभसमयाला, गोड गोड ॥

*

दिपले पाहुनिया । देवही हर्ष भरे ।

ढाळुनीया सुमने वदती, धन्य धन्य धन्य…

रचना : मो. ग. रांगणेकर

 प्रेम आहे ते वृद्धिंगत व्हावे!

©  श्री श्रीनिवास गोडसे

(गोड Say परीवार)

इचलकरंजी, मो – 9850434741

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print