मराठी साहित्य – विविधा ☆ डाॅक्टर आणि वेटिंग रूम… ☆ सौ. श्रेया सुनील दिवेकर ☆

?  विविधा ?

☆ डाॅक्टर आणि वेटिंग रूम… ☆ सौ. श्रेया सुनील दिवेकर ☆ 

माणूस आजारी पडला, की त्याला दहा दवाखाने फिरायला लागतात. दहा डॉक्टरांच्या दहा तर्‍हा. एकाच एक मत, तर दुसर्‍याचं बरोबर त्याच्या विरुद्ध. प्रत्येक जण वेगवेगळ्या चाचण्या करून घ्यायला सांगतो. एकाचा रिपोर्ट दुसर्‍याला चालत नाही. खरं तर दोन दिवसांपूर्वी सुद्धा रक्त आपलेच असते बरं का! पण तरीही त्याचे आलेले रिपोर्ट दोन दिवसांनंतर दुसर्‍या डॉक्टरांना चालत नाहीत. तसं काहीसं माझ्या बाबतीत झालं आणि मला अनेक डॉक्टरांच्या तसेच तिथे असणार्‍या वेटिंग रूमच्या अनेक तर्‍हा अनुभवायला मिळाल्या.

मी माझ्या नेहमीच्या डॉक्टर काकांच्या क्लिनिक मधे माझा नंबर येण्याची वाट पाहत बसले होते. नेहमी प्रमाणे दवाखाना खचाखच भरलेला होता. काहींना टेस्टचे रिपोर्ट दाखवायचे होते तर काहींना तपासून घ्यायचे होते. काहीजण आपल्या पेशंट बरोबर आले होते.

जे बरोबर आले होते ते उगीचच इकडून तिकडे कर नाहीतर मोबाईल बघ, ओळखीचे कोण असेल तर इकडच्या तिकडच्या गप्पा मार असं काहीतरी करत बसले होते. एका लहान आजारी मुलाला घेऊन त्याची आई आली होती, तिच्या मात्र जिवाची घालमेल चाललेली होती.

सारखं, त्याच्या डोक्याला हात लावून किती ताप आहे पहात होती. एक आजी खूप अस्वस्थ वाटत होती ती सारखी आपल्या नवऱ्याला काय आला असेल हो रिपोर्ट असं विचारतं होती.

एक गृहस्थ मात्र उगीचच केबिन च्या आत डोकावून डॉक्टर दिसतात का ते पहात होते. त्यांना एकदाचे ते दिसले आणि त्यांनी चक्क उठून त्यांना नमस्कार केला आणि आपल्या सौ ला म्हणाले बरीच वर्ष झाली ओळखतो मी ह्यांना अगदी देव माणूस.

दोन आज्या एकमेकांना आपापली व्यथा सांगून आपला आजार दुसरी पेक्षा किती सौम्य किंवा गंभीर आहे ह्याची खात्री करून घेत होत्या. त्यातलं फारस दोघींना ही कळत नव्हते ही गोष्ट वेगळी.

एका कोपर्‍यात दोघी मैत्रिणी आजार आणि त्यावरचे घरगुती उपाय ह्यावर चर्चा करत होत्या, तर दुसरीकडे दोघी जणी कोणत्यातरी भाजीची रेसीपी सांगण्यात गर्क होत्या. इतक्या की त्यांचा नंबर आलेला ही त्यांना कळले नाही. थोडक्यात काय दवाखाना असला तरी वातावरण गंभीर नव्हते.

मी ही तशी इथे रिलॅक्स असते. भीती नसते मनात ना दडपण असते. कारण हे माझे डॉ काका म्हणजेच डॉ शिवानंद कुलकर्णी खूप शांत आणि प्रेमळ आहेत. विनाकारण एखाद्या आजाराचं खूप मोठं चित्र उभ करत नाहीत, ना टेंशन देतात. चेहर्‍यावर नेहमी हास्य असते मग तुम्ही अगदी दवाखाना उघडल्या उघडल्या जा किंवा बंद व्हायच्या वेळी. काही होत नाहीगं एवढ्या गोळ्या घे, बरी होशील… एवढ्या त्यांच्या वाक्यांनेच निम्मे बरे व्हायला होते.

मला नेहमी एक प्रश्न पडतो तो म्हणजे ते एकाच वेळी सहा, सहा पेशंट आत घेतात. त्या पेशंटची बडबड, गलका चालू असतो तरीही ते एवढे शांत कसे काय राहू शकतात ? प्रत्येकाचा आजार वेगळा, कोण खोकत असतो, कोण कण्हत असतो कोणाचे इंजेक्शन असते, कोणाचे ड्रेसिंग, तर कोणाचे आणि काय. तरी काका आपले प्रत्येकाशी तितक्याच आपुलकीने चौकशी करत असतात. म्हणून तर ते प्रत्येकाला आपले वाटतात…

असो इथली तपासणी करून मी orthopedic दवाखान्यात गेले. तिथे तर पेशंटचा समुद्रच होता. समुद्र म्हणल्यावर ओळखले असलेच तुम्ही. हा समुद्र म्हणजे मिरजेचे नामांकित आणि तज्ञ डॉक्टर G. S. कुलकर्णी. आता आपल्याला किती वेळ वाट पहावी लागेल ह्या विचारानेच निम्मे दमायला झाले. मनात आले कशाला लोकं इतकी धडपडून आपली हाडं मोडून घेतात काय माहीत.

आधीच टेंशन आलेलं त्यात आजूबाजूला सगळेच पेशंट मोडक्या अवस्थेत. कोणाचा हात बांधला होता तर कोणाचा पाय फ्रॅक्चर होता .कोणाच्या मानेला पट्टा, तर कोणाच्या कंबरेला.

एकीकडे एक्सरे साठी गर्दी होती तर दुसरीकडे MRI साठी. कोण ड्रेसिंग साठी आले होते तर कोणाचे प्लास्टर घालणे चालू होते. थोडक्यात काय तर दवाखान्याचे वातावरण गंभीर होते. इथे कोणीच relaxed नव्हते.

मी एका कोपर्‍यात माझा नंबर येण्याची वाट पाहत बसले. तिथेच बाजूला एक लहान मुलगा आपल्या प्लास्टरवर चित्र काढत बसला होता. ते पाहून मला खूप छान वाटले आणि माझ टेंशन कुठल्या कुठे पळून गेलं. मोठी माणसं विनाकारण एखाद्या गोष्टीचा जास्त बाऊ करतात असं मला वाटलं.

तिथला नंबर माझा झाला आणि मला काही व्यायाम करण्याचा सल्ला दिला गेला. नशिबाने मला मानेचा दागिना लागला नव्हता. म्हणुन तिथून मी physiotherapist कडे गेले.

तिथे ही बाहेर बरेचजण बसले होते आपला नंबर कधी येणार ह्याची वाटं बघत. मीही वाट पाहू लागले. तिथे एक गृहस्थ त्यांचे व्यायाम दुसर्‍या गृहस्थांना शिकवत होते जणू त्यांची आता त्यात पीएचडी झाली होती. मला तर हे बघून हसूच येत होते. तेवढ्यात तिथे एक आई आपल्या तान्हुल्याला घेऊन आली. त्याला कोणतातरी गंभीर आजार झाला होता. बाळाला मानही वर करता येत नव्हती. हातात ही काहीतरी दोष होता. आईच्या चेहर्‍यावर काळजी दाटली होती. ते पाहून मात्र मला खूप वाईट वाटले. देवाकडे मनोमन प्रार्थना केली की ह्या बाळाचा आजार लवकर बरा होऊदे रे बाबा.

शेवटी एकदाचा नंबर आला माझा.

बरेच व्यायाम आणि सूचना घेऊन मी बाहेर पडले. मला जरा शंका जास्त असतात, त्यामुळे मी खूप शंका त्या डॉक्टरांना विचारल्या. त्यांच वैशिष्ट्य म्हणजे ते प्रत्येक शंकेचे निरसन जितक्या वेळा मी विचारेन तितक्या वेळा न चिडता सांगत होते. त्यांनी मला शांत पणे सगळ्या प्रश्नांची उत्तरे दिली. हे म्हणजे माझे physiotherapist डॉक्टर सुनील होळकर. प्रत्येक व्यायाम दोन दोनदा दाखवला आणि माझ्याकडून तो करून ही घेतला. त्यामुळे मनातली भीती नाहीशी झाली, आणि आपण लवकरच बरे होऊ ह्याची खात्री पटली.

अश्या तर्‍हेने अनेक दवाखाने फिरून मी घरी पोहोचले. घरी पोचले तेव्हा खूप दमून गेले होते. पण आज मला अनेकांची आजारपणे, तक्रारी, हाल, वेदना पहायला, अनुभवायला मिळाल्या होत्या. अनेक प्रश्न होते लोकांचे, ज्याची उत्तर शोधण्यासाठी ते दवाखाने फिरत होते. काहींना उत्तर मिळाली होती तर काही उत्तर मिळायच्या प्रतिक्षेत होते.

ह्या सगळ्यात आणखीन एक गोष्ट जाणवली ती म्हणजे जितक्या व्यक्ति तितक्या तक्रारी असतात. प्रत्येकांचे डॉक्टर वेगवेगळे असतात.

काही डॉक्टर उग्र, गंभीर, तर काही शांत, प्रेमळ असतात.

प्रत्येक डाॅक्टरांना रोज तेच तेच आजार आणि असंख्य पेशंट तपासायचे असतात. तेच तेच निदान अणि त्याच त्याच टेस्ट सांगायच्या असतात, रोज तेच प्लास्टर आणि रोज तेच तेच व्यायाम शिकवायचे असतात.

त्यांना तेच तेच असतं पण पेशंट साठी मात्र प्रत्येक गोष्ट नवीन असते. कारण ती त्यांच्या आयुष्यात पहिल्यांदाच घडत असते. जे डॉक्टर हे लक्षात ठेऊन पेशंटशी न दमता, न थकता आपुलकीने बोलतात ते आपलेसे वाटून जातात. आपल्या मनात त्यांच्या बद्दल एक आदर, एक विश्वास निर्माण करतात आणि नकळत मनात एक वेगळं घर बनवून जातात.

©  सौ. श्रेया सुनील दिवेकर

मो 9423566278

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ त्याग… ☆ श्री तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

?  विविधा  ?

☆ त्याग… ☆ श्री तुकाराम दादा पाटील ☆ 

मावळताना दिवस मन उगाच कातर होतं. का ? कसं ? कशासाठी ? आजवर कधीच कळलं नाही . जगण्याच्या चाकोरींची गतिमानता थांबवणे अवघड काम .

ते  -हाटगाडग्यासारखं,सतत फिरत रहातं पोटासाठी , प्रतिष्ठेसाठी ,नात्यागोत्याच्या गुंत्यासाठी आणि भूतकाळात उपभोगलेल्या लाघवी स्वप्नांच्या स्मरणासाठी. सारंच कसं खूप धुसर झालेलं असतं काळाच्या पडद्याआड. वर्तमानात त्याची दखलही घेता येत नाही. टाळताही येत नाही त्याला . आठवण पाठपुरावा करणंही काही केल्या सोडत नाही. करायचं तरी काय ? हा यक्षप्रश्न भेडसावतो सारखा . मग लागीर झालेलं झाड घुमत रहाव तसंआपणही धुमसत रहातो आतल्याआत, हिम्मत हरवलेल्या मांत्रिका  सारखं .  इथंच डोकावतो मनोनिग्रह . स्थितप्रज्ञ होण्यासाठी  सावरायला . ओळख त्याला. जवळ कर .  सगळं काही काळजात बंदिस्त करून तूच चौकीदार हो मनाचा. ठणकावून सांग त्याला, बलदंड पुंडासारखा वागलास तर याद राख. आता देहाचा वारु थकलाय , त्याला गरज आहे विश्रांतीची . ती दिली नाहीस तर मीच परागंदा होईन इथून . मग मला नको विचारूस. ज्याला आत्मा म्हणतात तो तूच काय ? म्हणून म्हणतोय तुला शांत हो. निरभ्रांत हो. लगाम घाल मनाला.  वाच चार ओळी अध्यात्माच्या, संत महंतांच्या , भारतीयांच्या थोर परंपरेच्या आणि वानप्रस्थ हो योग्या सारखा .

त्याग करून तुझाच  तू. अरे, मी हे सगळं सगळ्यांसाठी सांगतोय.  तू कोण टिकोजीराव लागून गेलास माझ्यापुढे ? 

त्याग हा सर्वश्रेष्ठ मंत्र आहे आत्मशांतीचा. म्हण ॐ शांती शांती.

© श्री तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ बहुत खोया, कुछ न पाया… ☆ श्री सुरेश नावडकर ☆

श्री सुरेश नावडकर
परिचय

जन्म – सातारा जिल्हा.

शिक्षण – भावे प्राथमिक व माध्यमिक न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड व  रमणबाग शाळेत झाले. बी एम सी सी मधून बी.काॅम.

चित्रकलेची आवड असल्यामुळे कमर्शियल आर्टिस्ट म्हणून कामाला सुरुवात केली. नाटक, चित्रपटांच्या जाहिराती, पोस्टर डिझाईन, पुस्तकांची मुखपृष्ठ, अशी गेली पस्तीस वर्षे कामं केली. या निमित्ताने नाट्य-चित्रपट क्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञांशी संपर्क झाला. भेटलेली माणसं वाचण्याच्या छंदामुळे ही माणसं लक्षात राहिली. 

कोरोनाच्या लाॅकडाऊनच्या काळात त्यांना, आठवणींना, कथांना शब्दरुप दिले. रोज एक लेख लिहिता लिहिता भरपूर लेखन झालं. मराठी विषय आवडीचा असल्यामुळे लेखनात आनंद मिळू लागला. वाचकांच्या प्रतिसादाने लेखन बहरत गेले.

?  विविधा ?

☆ बहुत खोया, कुछ न पाया… ☆ श्री सुरेश नावडकर

आज, साठी ओलांडलेल्या पिढीने खूप काही गमावलंय.. आणि जे मिळालंय.. ते तडजोड करुन स्वीकारलंय… काळ बदलला, मात्र मन पुन्हा पुन्हा त्या रम्य भूतकाळातच जातं…

पार्टीमध्ये ‘चिअर्स’ करुन, ग्लासला ग्लास भिडवायला शिकलो, मात्र ‘वदनी कवळ घेता’ म्हणायचं असतं.. ते विसरलो….

वेलकम ड्रिंक म्हणून, माॅकटेल प्यायला शिकलो, मात्र जेवण सुरु करण्यापूर्वीचं.. आचमन घेणं विसरलो..

हक्का नुडल्स, ट्रिपल शेजवान काट्याने गुंडाळून तोंडांत कोंबताना, अस्सल चवीची.. शेवयांची खीर विसरलो..

हाताने वरण-भात, ताक-भात खाण्याची लाज वाटू लागली परंतु काट्या चमच्याने पुलावाची शिते गोळा करुन खाताना, फुशारकी वाटू लागली..

पावभाजीवर.. जादा अमूल बटरचा आग्रह धरु लागलो, मात्र वाफाळलेल्या वरण-भातावरची तुपाची धार विसरलो… 

बिर्याणी, फ्राईड राईस, जिरा राईस खायला शिकलो, पण ‘वांगी भात, मसाले भात, मुगाची खिचडी म्हणजे नक्की काय असतं?’ या नातवाच्या प्रश्नावर निरुत्तर झालो…

एकेकाळी पुरणपोळी, श्रीखंड, लाडू, जिलेबीवर ताव मारण्याचे विसरुन गेलो, आता मात्र जेवणानंतर स्वीट डिश म्हणून दोनच गुलाबजाम व चमचाभर आईस्क्रीमवर समाधान मानू लागलो..

दोन्ही हात वापरुन ब्रेड, पाव खाऊ लागलो, मात्र आईने शिकविलेला ‘एकाच हाताने जेवावे’ हा संस्कार.. विसरुनच गेलो..

‘सॅलड’ या भपकेदार मेनूमधील झाडपाला मागवून खाऊ लागलो, पण कोशिंबीर, चटण्या, रायते हद्दपार करुन बसलो…

इटालियन पिझ्झा, पास्ताची आॅनलाईन आॅर्डर होऊ लागली, मात्र अळूची पातळ भाजी, भरली वांगी, बटाट्याची भाजी बेचव वाटू लागली…

मठ्ठा, ताक, सार हे शब्दच विसरुन गेलो, पण जेवणानंतर फ्रेश लेमन, सोडा का नाही? हे बिनधास्तपणे विचारु लागलो…

साखर भात, लापशी, गव्हाची खीर इतिहास जमा झाली अन् स्वीट म्हणून आईस्क्रीम, फालुदाची.. गुलामी स्वीकारली…

मसाल्याचे वास तसेच ठेवून पेपर नॅपकीनने हात व तोंड पुसू लागलो, मात्र जेवणानंतर हात स्वच्छ धुवून, खळखळून चूळ भरणं.. विसरुन गेलो..

थोडक्यात, आरोग्याच्या सर्व सवयी सोडून देऊन, पाश्र्चात्यांचं अनुकरण करत, स्वास्थ्य बिघडवून कमी वयातच शारीरिक व्याधींना बळी पडू लागलो…

‘जुनं ते सोनं’ समजून घेतलं तर अजूनही वेळ गेलेली नाहीये.. पण ‘सुरुवात कधी करायची?’ इथंच गाडी अडलेली आहे….

(या रचनेचे सर्वाधिकार रचयिता  ©️ सुरेश नावडकर यांच्याकडेच आहेत)

© सुरेश नावडकर

२२-५-२२

मोबाईल ९७३००३४२८४

 ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ विचार–पुष्प – भाग 20 – महासमाधी ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆

डाॅ.नयना कासखेडीकर

?  विविधा ?

☆ विचार–पुष्प – भाग 20 – महासमाधी ☆ डाॅ.नयना कासखेडीकर 

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका विचार–पुष्प.

नरेंद्रनाथ यांच्या जीवनाचा नवा अध्याय सुरू झाला होता. श्रीरामकृष्ण, स्वामी विवेकानंद घडवित होते. नरेंद्रनाथांच्या प्रापंचिक अडचणी हळूहळू कमी होत होत्या. पुस्तकाची भाषांतरे आणि काही काळ नोकरी करून ते आर्थिक बाजू सावरत होते. एव्हाना १८८३-८४ या काळात श्रीरामकृष्ण कलकत्त्यातील सर्वांच्या परिचयाचे झाले होते. त्यांच्या दर्शनासाठी आणि उपदेश ऐकण्यासाठी झुंडीच्या झुंडी येत असत लोकांच्या,

विसाव्या शतकातील एक आदर्शाचा परिपूर्ण आविष्कार म्हणजे भगवान श्रीरामकृष्ण समजले जात. म्हणूनच संन्यासीश्रेष्ठ स्वामी विवेकानंदानी समस्त समाजाला घनगंभीर आवाजात ऐकविले होते, “जर तुम्हाला डोळे असतील तरच तुम्ही पाहू शकाल. जर तुमच्या हृदयाचे दार उघडे असेल तरच तुम्हाला ते जाणवू शकेल. ज्याला समयाची लक्षणे, काळाची चिन्हे दिसू शकत नाहीत, समजू शकत नाहीत, तो अंध, जन्मांधच म्हटलं पाहिजे. दिसत नाही की काय, दरिद्री ब्राम्हण आईबापाच्या पोटी एका लहानशा खेड्यात, जन्मलेल्या या मुलाची आज तेच सारे देश, अक्षरश: पूजा करीत आहेत. की जे शतकानुशतके मूर्तिपूजेविरुद्ध सारखी ओरड करीत आले आहेत”.

नरेंद्रनाथांना देवदेवतांची दर्शने होत होती. पण ही सगळी साकार रुपे होती. त्यात त्याचे समाधान होत नव्हते. अद्वैताचा अनुभव देणारी निर्विकल्प समाधी त्यांना हवी होती. ज्ञान, साधना आणि गुरूंचे समर्थ मार्गदर्शन यांच्यामुळे नरेंद्रनाथांनी अनेक वेळा आत्मसाक्षात्काराचा अनुभव घेतला. निर्विकल्प समाधीचा अनुभव पण त्यांनी घेतला.

१८८६ मध्ये ,या सगळ्या काळात श्रीरामकृष्ण यांची तब्येत बिघडली. घशाच्या कर्करोगाचे निदान झाले. उपचारासाठी कलकत्ता आणि नंतर काशीपूर मध्ये एक घर घेऊन तिथे उपचारासाठी त्यांना ठेवण्यात आले. सर्व भक्त मंडळी चिंतेत होती. श्रीरामकृष्णांच्या सेवा सुश्रुशेचा बंदोबस्त, त्यांची निगा राखणे यासाठी नरेंद्र नाथांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला आणि घर सोडून श्रीरामकृष्ण यांच्या सेवेसाठी काशीपूरला येऊन राहिले जेणे करून चोवीस तास सेवा करता येईल.

इतर भक्त पण येऊन राहत असत. हे घर आता नुसते निवास न राहता तो एक मठ आणि विश्वविद्यालय होऊन बसले होते. भक्तगण साधना, निरनिराळ्या शास्त्रांचे पठण करत. रामकृष्ण यांच्या सेवेच्या निमित्ताने सर्व भक्त एकत्र राहत असल्याने सर्वजण एका आध्यात्मिक प्रेमबंधाने एकमेकांशी जोडले गेले. इथेच भावी श्रीरामकृष्ण संघाची मुहुर्तमेढ रोवली गेली म्हटले तरी चालेल. शुभ दिवस पाहून श्री रामकृष्ण यांनी सर्व कुमार शिष्यांना भगवी वस्त्रे देऊन संन्यास देण्याचा संकल्प केला. 

गुरूंचा आजार बळावला होता. श्री रामकृष्ण यांच्या अखेरच्या दिवसातले त्यांचे उद्गार, लौकिक-अलौकिक, पार्थिव-अपार्थिव, क्षणिक-चिरंतन अशा दोन्ही बाजूंची स्पष्टता करणारे होते. मात्र हे जग सोडून जातांना आपला अनमोल वारसा कोणाकडे सोपवून जायचा, तो जपता यावा म्हणून त्याच्या मनाची कशी सिद्धता करायची याचा विचार शेवटपर्यंत त्यांच्या मनात असे.

अशा परिस्थितीतही सदासर्वकाळ ते बालक भक्तांना उपदेश देण्यात दंग असत. कधी नरेंद्रनाथांना जवळ बोलवून सांगत, “नरेन ही सारी मुले मागे राहिलीत. तू या सार्‍यापरिस बुद्धीमान आणि शक्तिमान आहेस. तूच त्यांच्याकडे पहा. त्यांना सन्मार्गाने ने. हे सारे आध्यात्मिक जीवन घालवतील. यातला कुणी घरी जाऊन संसारात गुंतणार नाही असे पहा. मी आता लवकरच देह सोडीन. त्यांच्या वारसदारांच्या अग्रणी नरेंद्र च होता. ‘नरेंद्र हा तुमचा नेता आहे’ असे रामकृष्ण शिष्यांनाही सांगीत.

महासमाधीच्या तीन-चार दिवस आधी, श्री रामकृष्णांनी नरेंद्रला आपल्या खोलीत बोलावले, आपली दृष्टी त्यांच्यावर स्थिर केली. आणि ते समाधीत मग्न झाले. जणू एखादा विजेचा प्रवाह आपल्या शरीरात शिरतो आहे, असा भास नरेंद्रला झाला. त्याचे बाह्य विश्वाचे ज्ञान नष्ट झाले. पुन्हा भानावर आल्यावर पाहतो तो, श्री रामकृष्णांच्या डोळ्यातून अश्रुधारा लागल्या आहेत. काय झालं असे नरेंद्र नाथांनी विचारताच, रामकृष्ण म्हणाले, “नरेन माझ्याजवळ जे काही होतं, ते सारं मी तुला आज देऊन टाकलं आणि आता मी केवळ एक फकीर झालो आहे. माझ्याजवळ दमडी देखील उरलेली नाही. मी ज्या शक्ति तुला दिलेल्या आहेत,त्यांच्या बळावर तू महान कार्य करशील आणि ते पुरं झाल्यावर तू जिथनं आला आहेस तिथं परत जाशील”.

 शेवटी शेवटी क्षणाक्षणाला त्यांच्या वेदना वाढत होत्या. कोणत्याही औषधाचा काहीच उपयोग होत नव्हता. श्वासोच्छवासाचा त्रास होत होता. तेव्हढ्यात त्यांची समाधी लागली. नरेंद्रनाथांच्या सांगण्यावरून नरेंद्रसहित सर्वांनी, ‘हरी ओम तत्सत’ चा घनगंभीर आवाजात गजर सुरू केला. काही क्षण भानावर येऊन त्यांनी नरेंद्रला अखेरचे काहीतरी सांगीतले आणि कालीमातेचे नाव घेऊन शरीर मागे टेकवले. त्यांच्या चेहर्‍यावर एक ईश्वरी हास्य होते आणि ते अखेरच्या समाधीत गेले होते. त्यांनी पार्थिव शरीराचा त्याग केला. शिष्यांच्या दु:खाला पारावार राहिला नाही. त्यांच्या जीवनातला चालता बोलता प्रकाश हरपला होता. महासमाधी ! 

क्रमशः…

© डॉ.नयना कासखेडीकर 

 vichar-vishva.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ शायद फिर इस जनम में … ☆ श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? विविधा ?

☆ शायद फिर इस जनम में … ☆ श्री अमोल अनंत केळकर ☆ 

आजच्या रंगोलीत लागलेलं हे गाणं. सर्वाना माहित असणारे, आवडणारे आणि प्रसिद्ध झालेले हे गाणे. गीत/ संगीत / अभिनय या सर्व दृष्टीने जमून आलेले गाणे. या गाण्याला मी प्रेम गीत वगैरे पेक्षा ‘विरह गीत’ या कँटँगरीत बसवेन.

हे गाणे ऐकले आणि मला काहीच दिवसांपूर्वी ज्योतिष अभ्यासक श्री. सचिन मधुकर परांजपे (पालघर)  यांनी लिहिलेला एक लेख आठवला. त्याचा सारांश असा:-

==========================

टेक्निकली नियतीने एक समीकरण मांडलेलं असतं. सहवासाच्या अकाऊंटचं… जोवर ती वेळ, त्या सहवासाचे हिशेब पूर्ण होत नाहीत. अकाऊंट टॅली होत नाही तोवर तो मनुष्य आपल्या आयुष्यात असतो आणि नंतर निघून जातो

नियतीचा देणंघेण्याचा हिशेब पूर्ण झाला की माणसं आयुष्यातून काढता पाय घेतात. ..एखाद्या माणसाचं आयुष्यातून चटकन निघून जाणं (मी मृत्यूबद्दल म्हणत नाही)…. एक्झिट घेऊन पाठ फिरवून जाणं आणि पुन्हा कधीच न येणं हे तुम्ही नियतीचा खेळ म्हणून जितक्या सहजतेने स्विकार कराल तेवढे तुम्ही अधिकाधिक लवचिक, शांत आणि धीरोदात्त बनत जाता. कोणाचंही असं तडकाफडकी निघून गेल्यावर विनाकारण अपराधीपणाची भावना बाळगून स्वतःला दोष न देता सावरुन घ्या. शांत व्हा आणि गोष्टी स्विकार करत चला…. दुसरा पर्याय नसतो..”

=========================

फिर आप के नसीब में

ये बात हो ना हो

शायद फिर इस जनम

में मुलाक़ात हो ना हो

वरील लेख हा या गाण्याचे एक वेगळे रसग्रहण आहे असे म्हणले तर ते मुळीच चुकीचे ठरणार नाही

मंडळी,  असे अनुभव आपल्यालाही आलेत. लहानपणापासून आजपर्यंत अनेक व्यक्तींचा ठराविक कालावधीत आपला संबंध येतो मग अगदी बालपणीचे मित्र/ मैत्रीण असतील, शाळा / काॅलेज मधील असतील ,आँफीस मधले सहकारी असतील किंवा एखाद्या गावात परिचितांकडे भेटलेली एखादी कायम लक्षात राहिलेली ‘अवलिया ‘ व्यक्ती असेल.  ब-याचदा प्रासंगिक घटनांनी त्यांची आठवण येते, त्या ठिकाणी गेल्यावर प्रसंग उभे राहतात पण परत ती व्यक्ती भेटतेच असे नाही

मात्र वरील लेखात म्हणल्याप्रमाणे ज्यांच्याशी अजून तुमचे अकांट टॅली झाले नाही, म्हणजेच दुस-या अर्थाने अजून तुमचे ‘ ऋणानुबंध ‘ तितकेच जबरदस्त आहेत असे सुहृद तुम्हाला लवकरात लवकर भेटोत ही सदिच्छा

लेखाचा शेवट आजच्या रंगोलीतीलच आणखी एका गाण्याने

चले थे साथ मिलके चलेंगे साथ मिलकर

तुम्हे रुकना पड़ेगा मेरी आवाज़  सुनकर

( तुम्हे रुकना पड़ेगा मेरा लेख  पढकर😬)

 

शुभ रविवार 🙏

#माझीटवाळखोरीपुढे_चालू 📝

© श्री अमोल अनंत केळकर

२९/०५/२२

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

www.poetrymazi.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ देवाणघेवाण… ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

?विविधा ?

☆ देवाणघेवाण… ☆ श्री अरविंद लिमये ☆

शब्द म्हणजे भाषेचं वैभव!भाषेचे अलंकार! या अलंकारांचं रंगरुप,कस,त्यांची जडणघडण भाषेचं मोल वाढवतात.भाषा लवचिक आणि सुंदर बनवतात.भाषेचं हे रंगरुप,सौंदर्य शब्दांच्या विविध रंगछटांवरच अवलंबून असतं.

कांही शब्द परस्परभिन्न अर्थ लेवूनच तयार झालेले असतात. रूप तेच पण अर्थरंग मात्र अर्थाअर्थी काहीच संबंध नसलेले.

अशाच काही शब्दांपैकी ‘वाण’ हा शब्द.’ मूर्ती लहान पण किर्ती महान ‘ ही म्हण चपखलपणे लागू पडावी असा हा अगदी छोटा दोन अक्षरी शब्द ! वाण या शब्दाचे वेगवेगळे अर्थ आणि त्या प्रत्येक अर्थात लपलेल्या असंख्य अर्थकळा पाहिल्या की ‘भाषेचे सौंदर्य शब्दांमुळे खुलते’ हे सहज पटावे.

‘वाण’ म्हणजे अभाव. कमतरता. ‘येथे कशालाच वाण नाही’ म्हणजे सगळे उदंड आहे. कशाचंच दुर्भिक्ष,कमतरता, अभाव नाही. अभावाला एक प्रकारचे रितेपण,पोकळी, उणेपणा, हेच अपेक्षित आहे.या अर्थाने वाण हा शब्द कसर, चणचण, ददात, वानवा, अनुपलब्धता असं बरच कांही सामावून घेतो.

‘वाण’ म्हणजे ‘रंग’ सुध्दा. फक्त दृश्यरुपातले रंग नाही,तर व्यक्तिमत्त्वातले गुणदोष स्वभावरंगही.’गुण नाही पण वाण लागला’ या म्हणीत अंतर्भूत असलेला ‘रंग’ इथे अभिप्रेत आहे.

‘वाण’ म्हणजे नमुना. झलक, वानगी,म्हणजेच उदाहरण! याचं व्यवहारातलं एक उदाहरण म्हणजे धान्याचे दुकान! तिथे दर्शनी भागात लहान लहान वाडग्यात तांदूळ, गहू , डाळी, यांचे विविध नमुने म्हणजेच ‘वाण’ ठेवलेले असतात. ‘शितावरून भाताची परीक्षा’ करावी तसे त्या त्या धान्याचे ते वाण पाहून, तपासून कोणत्या प्रकारचे धान्य खरेदी करायचे याचा निर्णय घेणे सोपे जावे हा यामागचा उद्देश असतो.

‘वाण’ आणि ‘वसा’ या दोन शब्दांच्या संयुक्तरूपातून तयार होणारा ‘वाणवसा’ हा एक शब्द. वाणवसा म्हणजे ‘व्रत’. नित्यनेम म्हणून स्वीकारलेला एक आचार नियम!

वाण या शब्दाचा ‘घरी लागणारे किराणा सामान’ असाही एक अर्थ ‘वाणसामान’ या शब्दद्वयातून ध्वनीत होतो खरा पण मला तरी ‘वाणसामान’ हा शब्द वाण नव्हे तर ‘वाणी’ या शब्दाशी संबंधित असावा असे वाटते.वाणी म्हणजे दुकानदार. ‘वाण्याकडून आणावयाचे सामान’ ते वाणसामान या अर्थी हा शब्द बोलीभाषेतून तयार झालेला असावा आणि म्हणूनच वाण या शब्दाशी त्याचा अर्थाअर्थी काही संबंध नसावा असे वाटते.

‘वाण’ या शब्दाचा आणखी एक पूर्णपणे वेगळा अर्थ म्हणजे आहेर. आपल्या भारतीय संस्कृतीतील अनेक प्रथा-परंपरा माणसं जोडणाऱ्या आहेत. वाण देण्याची प्रथा ही त्यातलीच एक. ‘आहेर’ या शब्दाला भेट, उपहार, भेटवस्तू ,नजराणा, मानपान, शिष्टाचार, चोळी-बांगडी, घरचा आहेर असे अनेक कंगोरे आहेत.तसाच आहेर या शब्दाचा ‘वाण’ हा एक वेगळाच कंगोरा.एक अनोखा पैलू.वाण या शब्दात कोणत्याही विविध प्रसंगी दिलेले सगळ्याच प्रकारचे आहेर समाविष्ट होत नाहीत. लग्नमुंजीसारख्या समारंभात दिली जाणारी भेट किंवा भेटवस्तू म्हणजे आहेर.पण असे आहेर म्हणजे वाण नव्हे. काही विशिष्ट परंपरांमधील आहेरच ‘वाण’ म्हणून ओळखले जातात.’अधिक महिन्या’मधे जावयाला सन्मानाने दिला जाणारा आहेर म्हणजे अधिक महिन्याचं ‘वाण’. संक्रांतीचं वाण म्हणजे संक्रांतीच्या हळदीकुंकू समारंभात सुवासिनींना दिलेल्या नित्योपयोगी भेटवस्तू. या संक्रांतीच्या वाणाला ‘वस्तू लुटणं’ असंही म्हणतात. का माहित नाही. कदाचित ‘लयलूट’ याअर्थी असेल का?

वाण हा आपल्या      परंपरांमधला अतिशय मोलाचा सांस्कृतिक ठेवाच म्हणायला हवा. इथे वाण म्हणजे प्रेम,सन्मान, आपुलकी,सदिच्छा यांचे प्रतीक म्हणून दिला जाणारा आहेर.

भारतीय संस्कृतीत परस्परांमधील आपुलकीच्या  स्नेहबंधांसाठी ‘देवाणघेवाण’ अपेक्षित आहे. देवाण-घेवाण या शब्दातही ‘वाण’ हा शब्दही अंशरुपाने असणे हा निव्वळ योगायोग नसावा. आपल्या संस्कृतीत अपेक्षित असलेल्या प्रेम,आपुलकीची ‘देवाण-घेवाण’ काळानुरुप रितीभाती  बदलल्या तरी आपण विसरू नये एवढेच !!

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आपण हल्ली इतके तुसडे का वागतो ?… अनामिक ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर ☆

? विविधा ?

☆ आपण हल्ली इतके तुसडे का वागतो ? 🤔 … अनामिक ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर 

हल्ली एक बदल अगदी बटबटीतपणे आढळून येतो. पूर्वी कुठल्याही सणा – समारंभाला माणसे जमली की एकमेकांना भेटत असत. गप्पा तर संपता संपत नसत.

कार्यक्रमस्थळी म्हणजे घरामध्ये, मंडपामध्ये, कार्यालयामध्ये एखादे कुटुंब शिरले की त्याचे सहजपणे विभाजन होऊन पुरुष मंडळी आपापल्या वयाच्या पुरुष गटात, स्त्रिया त्यांच्या गोतात तर लहान मुले इतर मुलांमध्ये झटकन मिसळून जात असत. पुरुष पानसुपारीच्या तबकाभोवती किंवा एखाद्याची चंची उघडून गप्पाष्टक सुरु करीत. मुलांचा कुठलेही खेळणे उपलब्ध नसले तरी धुडगूस सुरु होत असे. तमाम स्त्रियांच्या वनितवृंदाचा खास एपिसोड सुरु होई. त्यावेळीही कुटुंबाकुटुंबांमधील मानापमान, माणसांमधील हेवेदावे होते. बायकांमधली असूया, धुसफूस, अबोला असायचा. मुलांचे एकमेकांना चिडवणे, बोचकारणे असायचे. तरीदेखील यासर्व गोष्टींच्या अस्तित्वासह लोकं एकमेकांना भेटत होती, एकमेकांकडे जात होती, बोलत होती. लग्नांमध्ये मानापानांवरून भांडणे व्हायची, रुसवे फुगवे व्हायचे. वितुष्ट,अबोला असला तरी तो फार थोड्या प्रमाणात असायचा. हे सारे अगदी बळवंतराव, सदुकाका, दामुअण्णा, अनुसूयाकाकू, गंगामावशी, सिंधूआत्या, बंड्या, चिंगी, चंदू यांच्यापासून ते अगदी वसंतराव, विश्वासराव, मालती, उषा, मोहन, किशोर यांच्यापर्यंत चालू होतं !

समाजामध्ये हल्ली एक बदल अगदी बटबटीतपणे आढळून येतो. लोकांचा एकमेकांशी नैसर्गिक संवाद जवळजवळ बंद झाला आहे. हल्ली घरांमध्ये होणारे छोटे समारंभ जवळजवळ बंद झाले आहेत. मध्यम कार्यक्रम किंवा मोठे कार्यक्रम हॉलमध्ये साजरे होतात. त्याला इतकी माणसं निमंत्रित असतात की यजमानाची तुमच्यावर एक नजर पडली तरी खूप झाले. मग जमलेली माणसं आपापला गट करूनच स्थानापन्न होतात. लगेचच सर्वांची ‘ कर्णपिशाच्च ‘ बाहेर येतात. सर्वजण तात्काळ स्क्रीनमग्न होतात. समारंभ कसला आहे, कोणकोण आलाय, काय चाललंय यांच्याशी कसलाही संबंध नसल्यासारखी माणसांची बेटं होऊन बसतात. मोबाईलवरील हा ‘ शब्देवीण संवादु ‘ संपला की थोडं इकडेतिकडे बोलायचे. त्यातही नैसर्गिक संवाद नसतातच. अरे आहेस कुठे, हल्ली काय नवीन, युसला गेला होतास ना, तू किती बारीक झालीस, ड्रेस काय मस्त आहे, तुझी मुलगी काय क्यूट दिसते, मुलगा काय ICSE ला ना, असले औपचारिक संवाद घडतात. तेवढ्यात कुणाचा तरी मोबाईल वाजतो आणि हा संवादसुद्धा थांबतो. कुणी आपणहून कुणाशी अकृत्रिमपणे बोलतच नाही. प्रत्येकाला दुसऱ्याबद्दल असे वाटते की ” तो हल्ली स्वतःला खूप शहाणा समजतो ” ! बरं, हे सगळे बाजूला सारून जर एखादा आपणहून सर्वांकडे जाऊन बोलू लागला तर इतरांना वाटतं ” हा हल्ली ज्याच्या त्याच्या गळ्यात का पडतो कुणास ठाऊक “!…… हे सगळे अनुभवल्यावर असे वाटते की काय झालय आपल्याला ? आपण हल्ली इतके तुसडे का वागतो ?

मला त्याची कांही कारणे अशी वाटतात. माणसांचे एकमेकांवरील अवलंबित्व संपत चालले आहे. सक्तीची एकत्रित कुटुंब पद्धती, पैशांचे पाठबळ, मनुष्यबळ, रात्री अपरात्री लागू शकणारी मदत, सुरक्षितपणा, धंदेवाईक असलात तर व्यवसायबंधूंचा आधार अशा अनेक गोष्टींमुळे पूर्वी माणसं एकमेकांशी जोडलेली राहत असत. आता एकत्रकुटुंब मोडून छोटीछोटी कुटुंब झाली. माणसांचे उत्पन्न वाढले त्यामुळे खर्च करण्याची शक्ती वाढली. बँकांमधून मिळणारी कर्ज, एटीएम इत्यादींमुळे पैशाची आकस्मिक गरज भागते. पैसे टाकला की मनुष्यबळ उभे करता येते. घरात आजारी माणसाला सांभाळणाऱ्या माणसापासून मंगल कार्यातील कॅटररच्या फौजेपर्यंत सर्व काही उभे करता येते. अपरात्री फोन करून रुग्णवाहिका येते तर मृत्युप्रसंगी सर्वकांही सांभाळणाऱ्या व्हॅन मागवता येतत. ऑनलाईन खरेदी विक्रीमुळे धंदेबंधुंची गरज संपत चालली आहे.

समाजाऐवजी गटसमूह तयार होतायत. त्यात राहूनही माणूस एकाकी पडतोय. मानसिक – भावनिक आधार तुटत चाललाय. अपयश, दु;ख, आजारपण अशा गोष्टींमुळे खचून संपूर्ण कुटुंबच जेव्हा आत्महत्त्या करते तेव्हा असे वाटते की काय झालय आपल्याला ?        वरकरणी सर्वत्र भरभराट आणि ऐश्वर्य दिसते.असे असतांना अति ताणामुळे मधुमेह, रक्तदाब, हृद्रोग वेगाने वाढतोय. माणसा – माणसांमधील सहज आणि नैसर्गिक संवादामुळे होणारे भावनांचे अभिसरण ( ventilation ) थांबलंय! जुनी मुरलेली मैत्री विसरून मित्र आपापल्या मोठेपणाच्या कोषात जाऊन बसतात. लग्नप्रसंगी, शुभकार्यात पूर्वीची एकमेकांना मदत करण्याची पद्धत गेली.लालच आणि पराकोटी चा स्वार्थ मुळे आता तर अगदी सख्खी भावंडंसुद्धा अडवणूक करतात. बोलणं बंद करतात, नाती तोडतात…. मग पुन्हा माणूस ‘ एकला चालो रे ‘ कडे वळतो. तुसडेपणाचे एक नवीन आवर्तन सुरु होते !

तरीही हा प्रश्न अनुत्तरीतच राहतो.. काय झालाय आपल्याला ? आपण हल्ली इतके तुसडे का वागतो ?

तुम्हाला कांही उत्तर सुचतंय का ?

रचना : अनामिक.

संग्रहिका: सौ.बिल्वा शुभम् अकोलकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ खुळखुळा… ☆ श्रीमती अनुराधा फाटक ☆

श्रीमती अनुराधा फाटक

? विविधा ?

☆ खुळखुळा… ☆ श्रीमती अनुराधा फाटक ☆ 

स्वरा उमाताईंची सहा महिन्यांची नात तशी खेळकर पण तिच्याजवळ कुणाला तरी बसावे लागे.त्यांची सून उषा अंघोळीला गेली होती म्हणून उमाताई स्वराजवळ बसल्या असतानाच गॅसवर दूध तापत असल्याचे त्यांच्या लक्षात आले.उतू जाईल म्हणून खेळणाऱ्या स्वराकडं बघतच त्या पटकन स्वयंपाकघरात गेल्या तसा स्वराचा रडलेला आवाज त्यांच्या कानावर आला.

‘ रडू दोन मिनिटं’म्हणत त्या दुधाजवळच थांबल्या तेवढ्यात त्यांच्या कानावर खुळखुळ्याचा आवाज आला. दूधही वर आले होते.गॅस बंद करून त्या बाहेर आल्या.शेजारचा निमिष स्वराजवळ खुळखुळा वाजवत बसला होता. स्वराही रडायची थांबली होती.

‘ आजी, मी बसतो खुळखुळा वाजवत’निमिष बोलत असतानाच उषाही अंघोळ करून बाहेर आली.तिनं स्वराला घेतलं.निमिष तिथच बसला.उमाताई मात्र कामाला लागल्या.काम करता करता त्यांना शिरीषचे,त्यांच्या मुलाचे बालपण आठवले.

एक दिवस शिरीष असाच रडत होता.उमाचे धाकटे दीर पेपर वाचत होते पण त्यांनी शिरीषकडं लक्ष दिलं नाही . हातातलं काम टाकून उमानं शिरीषला घेतलं.

‘ भाऊजी,बाहेर गेलात की शिरीषसाठी एक खुळखुळा आणा..’ दिरकडं बघत उमा बोलली.

‘ त्याचे वडील आणतील की..’पटकन उमाचा दीर बोलला आणि तिच्या डोळ्यात टचकन पाणी आले.चुकून संसारात पडलेला तिच्या नवऱ्याला कसलीच हौस नव्हती हे माहीत असलेल्या  दिराने तिच्या जखमेवरच मीठ चोळलं होतं.

‘ त्याच्या वडिलांचे माहीत नाही पण मी नक्की आणीन माझ्या शिरीषसाठी खुळखुळा.’त्यानंतर उमाने कधीच कुणाला काही सांगितले नाही स्वतःच्या हिमतीवर आपल्या मुलाची सर्व हौस पुरवली होती.

माणसाचं जीवन म्हणजे एक खुळखुळाच..’ उमा आपल्याच विचारात होती.जसा आयुष्याचा खुळखुळा वाजतो तसे आपण जगत असतो. परिस्थितिच्या खुळखुळ्यातून कधी मधुर नाद निघतो तर कधी त्या नादाने आपण खुळे बनतो,अस्वस्थ होतो. आपल्याला कळत नसतानाच आपल्या आयुष्यात आलेला हा खुळखुळा सतत वेगवेगळे नाद करून आपले आयुष्य घडवत असतो.कधी सुखावह तर कधी दुःखाची जाणीव त्यातून होते.असा हा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडं जाणारा खुळखुळा ! नाद खुळा करणारा खुळखुळा !

© श्रीमती अनुराधा फाटक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆☆ मनातलं  कागदावर ☆☆ सुश्री साधना प्रफुल्ल सराफ ☆

सुश्री साधना प्रफुल्ल सराफ

अल्प परिचय 

शिक्षण – B.Sc. (1st class with Hons) पुणे विश्वविद्यालय 

सम्प्रति – 1995 पासून फ्री लान्स ट्रान्सलेटर म्हणून कार्यरत.

यातील विशेष कामगिरी:

  1. समकालीन ब्रिटिश कवयित्री ही पाच भागांची मालिका स्त्री मासिकातून प्रकाशित.यामध्ये कवयित्रींचा परिचय व त्यांच्या दोन कवितांचा अनुवाद सादर करण्यात आला.
  2. अॅडव्हरटारझिंग बेसिक्स हे अनुवादीत पुस्तक डायमंड प्रकाशन तर्फे प्रकाशित.
  3. ‘मेडन व्हाॅयेजेस’ धाडसी महिलां नी एकट्याने केलेल्या साहसी प्रवासाची प्रवासवर्णने ‘मस्त भटकंती’ मधून प्रसिद्ध.
  4. ‘प्रतिमा पैलतिरीच्या’ या चरित्रात्मक लेखांचे पुस्तक प्रकाशित..2016मध्ये.
  5. ‘तुमचे आयुष्य तुमच्या हाती’ अनुवादीत,प्रकाशन 2018.

याशिवाय शेती व्यवस्थापन,जल व्यवस्थापन व पाणलोट विकास,आयुर्वेदिक वनस्पती विषयी माहिती,लहान मुलांसाठी प्रयोग विज्ञान मालिका अशा विविध प्रकारच्या साहित्याचे भाषांतर केले आहे.

या व्यतिरीक्त स्वतंत्रपणे कथालेखन,ललितलेखन चालू आहे.

? विविधा ?

मनातलं  कागदावर ☆ सुश्री साधना प्रफुल्ल सराफ

इथे नाशिकला आल्यापासून सकाळच्या वेळी बाहेरून पक्ष्यांचा सतत कलकलाट ऐकू येत होता. बाहेर बाल्कनीत येऊन नजर टाकली, तर शेवग्याच्या झाडावर इवल्याशा, मूठभर आकाराच्या सनबर्डस् ची नुसती झुंबड उडालेली दिसत होती. इतके सुरेख रंग त्यांचे, सूर्यप्रकाशात नुसते झळाळत होते. कोणी गडद निळ्या रंगामधे मधूनच झळाळणारी मोरपिशी छटा मिरवत होतं, आणि त्या मोरपिशी रंगाच्या पिसांवर ऊन पडल्यावर त्याच्यावर जी चमक येत होती, त्यावर नजर ठरत नव्हती! तर कोणाचा शेवाळी रंग मेंदीची आठवण करून देत होता. आणि काय ते त्यांचे विभ्रम! ते छोटुसं शरीर पूर्ण उलटं करून चोचीने त्या फुलांमधला मध ओढून घेऊन भुर्रदिशी उडून कुठेसे नाहीसे व्हायचे, बहुतेक त्यांच्या पिल्लांना तो मध भरवायला जात असावेत. काहीजण फक्त हाच उद्योग करत होते, तर काही उडाणटप्पू आपल्या जोडीदारांबरोबर मुक्तपणे विहरत होते. विलक्षण मोहक हालचाली होत्या त्यांच्या! त्या झाडामधून वरच्या दिशेला सूर मारून थोडसं वर आभाळात जाऊन ज्या काही सुरेख गिरक्या ते घेत होते, त्यानं माझी नजरबंदीच करून टाकली. परत वरून खाली सूर मारून त्या झाडाच्या फांद्यांमधूनही सफाईदार गिरक्या घेत थोडं खाली जाऊन उसळी मारून  परत वर आभाळात! आणि या सगळ्या खेळात सूर्यप्रकाशाचीही मोठी भूमिका होती बरं! या सगळ्या गिरक्या आणि परन्यास, हो! पदन्यास नव्हे, परन्यासच! चालू असताना, आकाशातून, झाडाच्या फांद्यांमधून पाझरणाऱ्या सूर्यकिरणांनी त्या नृत्याला एक विलक्षण अशी रंगभूषा पुरवलेली होती! एखाद्या गिरकीच्या वेळी फक्त गडद निळा रंग चमकलेला दिसायचा, तर वरच्या दिशेने सूर मारताना मोरपिशी छटा झळाळून उठलेली दिसायची. पटाईत नृत्यांगनांनी लाजून मान खाली घालावी अशा हालचाली होत्या त्या चिटुकल्या पक्ष्यांच्या! आणि दोघांची प्रत्येक हालचाल इतकी विलक्षणपणे सारखी, की हल्लीचं सिंक्रोनाईज्ड स्विमिंग किंवा डान्सिंग यांच्याकडून प्रेरणा घेऊनच रचत असावेत, याची खात्रीच पटली माझी!  

आणखी एक गम्मत माझ्या लक्षात आली, ती ही, की त्या झाडावर मध गोळा करणारे फक्त हे छोटेसे सनबर्डच दिसत होते. काही काळे भुंगे येत जात होते अधून मधून, पण आम्ही तिथे होतो, त्या पंधरा  दिवसात एकही मोठा पक्षी त्या झाडावर आलेला दिसला नाही मला. म्हणजे, आपण माणसं स्वतःला फार बुद्धिमान आणि सुसंस्कृत समजतो, पण पक्ष्यांमधे असलेली ही सुसंस्कृत जाणीव उरलेली आहे का आपल्यात? दुर्बल गटांसाठी असलेल्या योजनांमधील कितीसा वाटा प्रत्यक्षात मिळतो, त्यांना? त्याच्यावर डल्ला मारणारे गब्बर अधिकारीच जास्त असतात! पण या छोट्या पक्ष्यांना त्रास द्यायला, त्या शेवग्याच्या फुलांमधला मध त्यांना मिळू न देता, स्वतः हडप करायला एकही मोठा पक्षी तिथे आलेला एकदाही मला दिसला नाही! कशी आणि कोण, ही जाणीव त्या एवढ्याशा पाखरांच्या एवढ्याशा मेंदूमधे जागृत ठेवत असेल? इथे देवाचा अदृश्य हात जाणवतो मला तरी! आणि आपल्या मेंदूमधेही असतेच ना, ही जाणीव, ‘त्याने’ दिलेली? पण आपण स्वार्थापोटी ती जाणीव पुसून टाकून आपल्यापेक्षा दुर्बल गटातील माणसांना आणखी दुर्बल बनवत असतो. हा आपल्या अधिक बुद्धिमत्तेचा उपयोग, की दुरुपयोग?

नेहमी आपण ऐकत आलोय, की निसर्गाकडून चांगल्या गोष्टी शिकायला पाहिजेत, पण पंधरा दिवसात या पक्ष्यांकडे बघून काय शिकायला हवं, त्याची लख्ख जाणीव मनात जागी झाली! आता या जाणीवेचा प्रसार व्हायला हवा, म्हणून हा लेखनप्रपंच!

© सुश्री साधना प्रफुल्ल सराफ

संपर्क – 1565, सदाशिव पेठ, ‘लक्ष्मी सदन’, पी. जोग क्लास लेन, पुणे, ४११०३०. मो. 7709014058.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ महिनाअखेरचे पान – 5 ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? विविधा ?

महिनाअखेरचे पान – 5 ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

काळाच्या पुढे चार पावलं असावं असं म्हणतात.पण बघता बघता काळाचीच चार काय,पाचवही पाऊल टाकून झालं आणि उद्या सहाव पाऊल पडेल.हे पाचवं पाऊल  म्हणजेच वर्षाचा पाचवा महिना. तापवणाराही आणि सुखावणाराही! मे महिना! मे  म्हणजे वैशाख वणवा. मे महिन्याची अखेर म्हणजे ज्येष्ठाची चाहूल.संपूर्ण महिना जसा चटके देणारा तसाच सुट्टीच्या मोठ्या कालखंडामुळे  विद्यार्थी वर्गाला आनंद देणारा.लहान मुलांना मामाच्या गावाला घेऊन जाणारा,शिबिरांच्या निमित्ताने अभ्यासाव्यतिरिक्त नवीन काहीतरी शिकायला वेळ देणारा,मनसोक्त खेळू देणारा,लग्न समारंभातून सर्व आप्तेष्टांना भेटवणारा,थंडगार पेयांनी तहान भागवणारा आणि रसराज आंब्याच्या रसात बुडून जाताना फणसातील ग-यांचा वास घमघमवणारा मे महिना तो हाच.यामुळेच की काय,वणव्यासारखा पेटणारा सूर्य असूनही, त्याची दाहकता सोसूनही दरवर्षी आतुरतेने वाट बघायला लावणारा हा महिना, मे महिना! वैशाखातून ज्येष्ठाकडे नेणारा महिना.ग्रीष्मातील धारा विसरून मान्सूनच्या वा-यांचे स्वागत करायला उत्सुक असणारा महिना !

मराठी माणसाच्या स्वाभिमानाचा दिवस म्हणजे एक मे.याच दिवशी 1960 साठ साली भाषावार प्रांत रचनेप्रमाणे महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली.मराठी भाषा राजभाषा झाली. त्यामुळे आधुनिक महाराष्ट्राच्या स्थापनेचा हा महिना आपल्यासाठी खूपच महत्वपूर्ण आहे.

एक मे हा दिवस कामगार चळवळींचा गौरव करण्यासाठी जागतिक कामगार दिन म्हणूनही साजरा केला जातो.

तीन मे 1991 साली विंडहोक येथे पत्रकारांची आंतरराष्ट्रीय परिषद भरली होती. त्यात पत्रकारांच्या लिखाणाच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा सादर करण्यात आला. त्यानंतर 1992 पासून तीन मे हा दिवस वृत्तपत्र स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो. तर पाच मे हा दिवस जागतिक व्यंगचित्रकार दिन आहे.याच दिवशी 1895 साली पहिले रंगीत व्यंगचित्र ‘द यलो कीड ‘हे प्रकाशित झाले होते.

युद्धातील जखमी सैनिकांची सेवा शुश्रूषा करण्यासाठी जीन हेनरी ड्यूनेट यांनी मोहिम सुरू केली.ती संघटना म्हणजे रेड क्राॅस सोसायटी.म्हणून जीन यांचा जन्मदिवस आठ मे हा  दिवस रेड क्राॅस दिन म्हणून साजरा केला जातो.

आई हे दैवत आहे हे आपणा भारतीयांना तर माहित आहेच.पण हे महत्व लक्षात घेऊन आईचा सन्मान करण्यासाठी 1914 पासून आंतरराष्ट्रीय मातृ दिन झाला आहे  नऊ मे हा दिवस. आईप्रमाणेच ममता देणा-या आणि सेवाधर्म पाळणा-या परिचारिकांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बारा मे हा जागतिक परिचारिका दिन आहे.कारण आधुनिक शुश्रूषा शास्त्राच्या संस्थापिका फ्लाॅरेन्स नाइटिंगेल यांचा तो जन्मदिवस आहे.

‘वसुधैव कुटुंबकम्’ ही भारतीयांची भावना आहे.शांतता,विचार आणि भावनांच्या देवाणघेवाणीची जाणीव निर्माण व्हावी या कल्पनेतून 1994पासून युनो कडून पंधरा मे हा दिवस जागतिक कुटुंब दिन म्हणून जाहीर करण्यात आला आहे.तसेच अठरा मे हा दिवस जागतिक वस्तू संग्रहालय दिन आहे.1991 साली माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची दहशतवाद्यांकडून हत्या झाली.तो दिवस होता एकवीस मे.त्यामुळे एकवीस मे हा दिवस जागतिक दहशतवादविरोधी दिन म्हणून पाळला जातो.एकतीस मे हा दिवस जागतिक तंबाखू  विरोधी दिन आहे.

गोवा पारतंत्र्यातून मुक्त झाल्यानंतर त्याला संपूर्ण राज्याचा दर्जा मिळाला तो तीस मे 1987 ला.त्यामुळे तीस मे हा गोवा राज्य दिन म्हणून साजरा केला जातो.

1998साली अकरा मे ला पोखरण येथे अणुचाचणी यशस्वी झाली.त्यानंतर 1992 पासून अकरा मे हा दिवस राष्ट्रीय विज्ञान व तंत्रज्ञान दिवस या नावाने  ओळखला जातो.     

असे  विविध दिन या  मे महिन्यात येत असतात.याच मे मध्ये म्हणजेच वैशाख पौर्णिमेला असते बुद्ध पौर्णिमा.बसवेश्वर जयंती,आद्य शंकराचार्य जयंती,छ.संभाजी महाराज जयंती,स्वा.सावरकर जयंती पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती ही याच महिन्यात असते.तसेच छ.शाहू महाराज,पं.नेहरू,राजीव गांधी यांचे स्मृतीदिन याच महिन्याताल.

शिवाय मुस्लिम धर्मियांचा रमजान ईद याच मे मध्ये साजरा होतो.

असा हा मे किंवा वैशाख सरता सरता पावसाच्या आगमनाच्या बातम्या सुरू होतात आणि क्वचित मान्सूनपूर्व सरीही पडून जातात.सुखद गारव्याची जाणीव, येणा-या पावसाची पुनःपुन्हा आठवण करून देते.शेतक-यासह सगळेच आकाशाकडे डोळे लावून बसलेले असतात.कारण नवजीवन प्राप्त करून देणारा,’जीवन’ घेऊन येणारा वर्षाऋतू येणार असतो,आपल्या तनामनाला न्हाऊ घालायला,वसुंधरेला फुलवायला !तो येईपर्यंत फक्त एवढंच म्हणायचं,’ये रे घना,  ये रे घना….

© सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares