मराठी साहित्य – विविधा ☆ अर्थपूर्ण भासे मज हा… ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

?विविधा ?

☆ अर्थपूर्ण भासे मज हा… ☆ श्री अरविंद लिमये ☆

एखाद्या शब्दाचं वर्णन करायला त्याच शब्दापासून तयार झालेले विशेषणच चपखल ठरावे असं क्वचितच पहायला मिळते. अर्थ हा असाच एक दुर्मिळ शब्द म्हणावा लागेल. ‘अर्थ या शब्दाचे सार्थ वर्णन करायला ‘अर्थपूर्ण’ हेच विशेषण यथार्थ ठरते’ या एकाच वाक्यात आलेले अर्थपूर्ण, सार्थ, यथार्थ, हे विविधरंगी शब्द ‘अर्थ ‘ या शब्दाच्या संयोगानेच जन्माला आलेले असणे हा योगायोग नव्हे तर आपल्या मराठी भाषेच्या सौंदर्याची सुंदर झलकच म्हणता येईल.!

‘अर्थ’ या शब्दाचं एक खास वैशिष्ट्य म्हणजे अर्थ या शब्दात परस्परभिन्न असे दोन अर्थ सामावलेले आहेत आणि त्या दोन्ही अर्थांनाही अंगभूत अशा खास त्यांच्याच विविध रंगछटाही आहेत.

अर्थ या शब्दाचा एक अर्थ म्हणजे धनसंपत्ती.आणि दुसरा अर्थ आशय.

या दोन्ही अर्थांचे विविध पैलू उलगडून दाखवणारे इतर असंख्य शब्दही आकाराला आलेले आहेत आणि त्या शब्दांतही ‘अर्थ’ आहेच. अर्थपूर्ण शब्दांचं हे फुलणं पाहिलं की एक सुंदर दृश्य माझ्या मनात अलगद तरळू लागतं. एखादं बी जमिनीत पेरावं तसा समजा एखादा शब्द पेरता आला असता तर तो अंकुरल्यानंतर त्याला कोवळी पालवी फुटावी आणि त्याच्या छोट्या छोट्या डहाळ्यांवर असंख्य शब्दफुले उमलावीत तसंच काहीसं ते दृश्य अर्थ शब्दाला सर्वार्थाने सामावून घेतेय असे जाणवत रहाते.’अर्थ’ शब्दाच्या संयोगाने आकार घेतलेले असंख्य शब्द पाहिले की त्यांना दिलेली ही शब्दफुलांची उपमा कशी समर्पक आहे हे लक्षात येईल.

अर्थ या शब्दाच्या संयोगातून जन्माला आलेले अनेक अर्थपूर्ण शब्द अर्थ या शब्दाचे सौंदर्य अधिकच खुलवत रहातात.अर्थ शब्दाच्या ‘धन’ ‘संपत्ती’ या अर्थाशी इमान राखत अर्थशास्त्र, अर्थसंकल्प,अर्थभान,अर्थसंचय सारखे असंख्य शब्द आपापल्या वेगवेगळ्या अर्थ आणि रंगांच्या छटांनी अर्थपूर्ण झालेले आहेत. या शब्दाचे आशय, अभिप्राय, कस हे अर्थरंग सांभाळत असतानाच स्वतःच्या वेगळ्या छटाही कौतुकाने मिरवणाऱ्या सार्थ,परमार्थ,स्वार्थ,कृतार्थ, निरर्थक,सार्थक, यासारख्या असंख्य शब्दांची खास त्यांची अशी वैशिष्ट्येही आहेतच. उदाहरणार्थ ‘निरर्थक’ हा शब्द.या शब्दाचा अर्थ उलगडून दाखवण्यासाठी अर्थशून्य, अर्थहीन,अनर्थक, व्यर्थ, पोकळ, वायफळ, भाकड, अकारण, अनावश्यक असे अनेक शब्द दिमतीला हजर होतात.सार्थ या शब्दाचा अर्थ अर्थासह,अर्थयुक्त यासारखे शब्द सोपा करुन सांगतात.स्वार्थ या शब्दाचे स्पष्टीकरण देणारेही मतलब, स्वहित,आत्महित,स्वसुख, आपमतलबीपणा असे अनेक शब्द आहेत.

एखाद्या शब्दाचे असंख्य पैलू उलगडून दाखवण्यासाठीच अगणित म्हणी रुढ झालेल्या असणं ऐकतानाही  अविश्वसनीय वाटेल पण ‘स्वार्थ’ या शब्दाला हे भाग्य लाभलेलं आहे.याचं प्रत्यंतर देणाऱ्या…’आवळा देऊन कोहळा काढणे’, ‘आपल्याच पोळीवर तूप ओढून घेणे’, ‘तुंबडी भरणे’,’आधी स्वार्थ मग परमार्थ’, ‘तळे राखी तो पाणी चाखी’, ‘आप मेले जग बुडाले’, ‘कामापुरता मामा’,’गरज सरो न् वैद्य मरो’ या आणि अशाच कितीतरी..!

हे पाहिले की भाषेचे नेमके सौंदर्य अशा अनेक शब्दफुलांच्या सौंदर्यातच सामावलेले आहे याची प्रचिती येते.मराठी भाषेचे अनेक प्रकारचे भाषालंकार,अर्थालंकार आहेत.यातील अनेक भाषालंकारांमधील ‘अर्थांतरन्यास’ या अलंकाराच्या रुपाने ‘अर्थ’ या शब्दाच्या सौंदर्यालाही खास सन्मान मिळालेला आहे..!

‘अर्थ’ या शब्दाला हिंदू तत्वज्ञानातही विशेष महत्त्व आहे. हिंदू धर्मतत्वज्ञान मानवी जीवनाचा अर्थ म्हणजेच पुरुषार्थ प्रदान करते. अशा पुरुषार्थाचे चार घटक धर्म,अर्थ, काम न् मोक्ष असे आहेत. म्हणजेच अनुक्रमे कर्तव्य, साफल्य, आनंद आणि मुक्ती ! यातील साफल्य या अर्थाने अर्थ हा शब्द माणसाच्या आयुष्याचे मर्मच अधोरेखित करतो.

मराठी भाषेचे सौंदर्य खुलवलेय ते अशाच असंख्य शब्दांनी ! त्यातही त्याच्या वर उल्लेखित सर्व विशेष आणि विविध कारणांमुळे मला सर्वार्थाने ‘अर्थपूर्ण’ भासतो तो ‘अर्थ’ हाच शब्द..!!

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ विचार–पुष्प – भाग 17 – उपदेश ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆

डाॅ.नयना कासखेडीकर

?  विविधा ?

☆ विचार–पुष्प – भाग 17 – उपदेश ☆ डाॅ.नयना कासखेडीकर 

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका विचार–पुष्प.

नरेंद्र आणि श्री रामकृष्ण यांची पहिली भेट १८८१ च्या डिसेंबरमध्ये दक्षिणेश्वरला झाली. ‘मन चलो निज निकेतने’, म्हणजे, ‘हे माझ्या मना आपल्या घरी परत चल’,आणि ‘जाबे की दिन अमार विफले चलीये’, म्हणजे, ‘माझे सारे दिवस असे व्यर्थच जाणार काय? अशी दोन बंगाली गीतं नरेन्द्रने मोठ्या आर्ततेने म्हटली आणि नरेंद्रचे व्यक्तिमत्व वेगळेच होते, कलकत्त्याच्या भौतिक शहरातून आलेला असूनही आध्यात्मिक धारणा असलेला नरेंद्र बरोबरच्या मित्रांमध्ये  वेगळा उठून दिसत होता. जे रामकृष्णांना  अत्यंत भावले होते. नरेंद्रचे भजन म्हणणे इतरांहून निराळे होते. त्या आर्त स्वरांनी श्री रामकृष्णांच्या अंत:करणाची तार छेडली गेली होती. “पहा पहा साक्षात सरस्वती त्याच्या उज्ज्वल दर्शनात प्रकट होत आहे”. असे उद्गार त्यांनी यावेळी भक्तांसमोर काढले होते.

नरेंद्रचे सुप्त आध्यात्मिक गुण रामकृष्णांनी ओळखले होते. त्यांनी नरेंद्रला विचारले, “रात्री झोपी जाताना डोळ्यासमोर प्रकाश दिसतो का?” नरेंद्र म्हणाला, “हो दिसतो”. त्यावरून रामकृष्णांनी ओळखले की हा जन्मत:च ध्यानसिद्ध आहे. पहिल्या भेटीतच रामकृष्ण नरेंद्रला म्हणाले होते, “किती उशीर केलास? प्रपंचात बुडालेल्या या सार्‍या लोकांच्या कथा ऐकून माझे कान किटून गेले आहेत. माझ्या खोल मनातील अनुभव ऐकून समजून घेणार्‍याची मी कधीची वाट पाहतोय. हे प्रभो मी जाणून आहे, की नारायणाचा अवतार असा जो प्राचीन नर ऋषि तो तू आहेस आणि मानव जातीच दु:ख हरण करण्यासाठी या पृथ्वीवर जन्म घेऊन आला आहेस”. आपलं असं कौतुक ऐकून नरेंद्र गोंधळून गेला होता.      

पुढे अजून भेटी झाल्या. रामकृष्णांना नरेंद्रची भेट रोज व्हावी असे वाटू लागले. श्रीरामकृष्णांच्या  रूपाने देव पाहिलेली व्यक्ती आपल्याला अखेर भेटली याचा आनंद नरेंद्रला झाला होता. वेगवेगळे अनुभव येत होते. नरेंद्र ब्राम्ह समाजात जात होताच. मूर्तिपूजा निषेध हा तिथल्या सिद्धांतापैकी एक सिद्धांत होता. इकडे श्री रामकृष्ण तर, कालिमाता मानणारे, तिन्ही त्रिकाल  पूजाअर्चा करणारे मूर्तिपूजक होते. मनात द्वंद्व चालू होतच. या सगळ्याचा मेळ लावायचा नरेंन्द्र प्रयत्न करत होता. काहीतरी सखोल अनुभूति त्यांच्यात आहे हे जाणवत होते. पवित्र अंत:करणाचा, सर्व मानवजातीने आदर करावा अशा योग्यतेचे ते आहेत असे मनाला पटले आणि नरेन्द्रने त्यांना मनोमन नमस्कार केला. जवळ जवळ चार वर्षे नरेंद्रला श्रीरामकृष्णांच्या सहवासात येऊन झाली होती.

श्रीरामकृष्ण यांच्याकडे रोज भक्तगण येत असत. त्यांच्याशी ते संवाद साधत असत, एखादा अवघड सिद्धांत स्पष्ट करताना ते छोट्या छोट्या कथांचा वापर करत आणि समजावून  सांगत असत. त्यांचे बोलणे हे नुसत्या ग्रंथांतील सिद्धांताच्या आधारवर नसे तर ते स्वत:च्या अनुभवावर आधारित असायचे. एकदा असेच भक्तांशी संवाद चालू असताना श्रीरामकृष्ण सांगत होते, “लोक आपल्यावर टीका करतील, पण आपण त्याकडे दुर्लक्ष करावे. आणि आपला मार्ग सोडू नये. कुत्री भुंकत असतात पण हत्ती आपल्या मार्गाने जात राहतो तशी आपली वृत्ती असावी”. असे विवेचन चालू असताना त्यांनी नरेंद्रला विचारले, काय नरेन तुला काय वाटतं ?ईश्वराची भक्ती करणार्‍यांची संसारी लोक त्यांच्या मागे निंदा नालस्ती करतात. तुझ्या माघारी लोक तुझ्याबद्दल वाईट बोलू लागले तर, तू काय करशील”? नरेन्द्रने उत्तर दिले, “ ती माणसं म्हणजे,उगाच भुंकणारी कुत्री आहेत. असं म्हणून मी त्यांच्याकडे साफ दुर्लक्ष करीन”. यावर श्री रामकृष्ण म्हणतात, “नाही नरेन एव्हढी कठोर प्रतिक्रिया होता कामा नये. अचेतन सचेतन अशा सार्‍या चराचरात तो ईश्वर भरून राहिलेला आहे. तेंव्हा कोणी  कसाही वागो, त्याच्याबद्दल योग्य तो आदर आपण ठेवला पाहिजे”.लोकांच्या टीकेकडे आपण दुर्लक्ष करावे. खरे पण त्या टीका करणार्‍यांबद्दल ही आपण आपल्या मनात दुजाभाव धरू नये. जो वाईट वागतो, त्याचेही आपण हिताच चिंतावे. असा उपदेश यातून दिसतो.

© डॉ.नयना कासखेडीकर 

 vichar-vishva.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ कव्हर… ☆ सौ. श्रेया सुनील दिवेकर ☆

?  विविधा ?

☆ कव्हर… ☆ सौ. श्रेया सुनील दिवेकर ☆ 

आज खूप वर्षानंतर पुस्तक विकत घेण्यासाठी पुस्तकांच्या दुकानात [ दालनात} गेले होते.

गेली अनेक वर्षे पुस्तकांना जणू पूर्णविराम द्यावा लागला होता, कारण तो दिला नसता तर माझ्या चिमुकल्यांमुळे एका पुस्तकाच्या अनेक प्रती तयार झाल्या असत्या….

आज मात्र अनेक वर्षांनी ह्या पुस्तकांना पाहून खूप आनंद होत होता. प्रत्येक पुस्तकांवरून नकळत हात फिरवला जात होता, अचानक लहानपणीची एक घटना आठवली. मी खूप छोटी असेन, मला माझे बाबा पहिल्यांदा पुस्तकांच प्रदर्शन बघायला घेऊन गेले होते.

खूप पुस्तके होती वेगवेगळ्या लेखकांची, वेगवेगळ्या विषयांची, काही संग्रही, काही लहानमुलांची, काही थोर नेत्यांची, मला त्यातले काहीही कळत नव्हते ती गोष्ट वेगळी.

माझे बाबा मात्र मला प्रत्येक लेखकाची माहिती देत होते. माझं लक्ष मात्र त्यांच्या बोलण्याकडे कमी, आणि पुस्तकांच्या छान रंगीत रंगीत आवरणावर जास्त होते. काहींवर सुंदर सुंदर पऱ्या होत्या, तर काहींवर अक्राळविक्राळ राक्षस,काहींवर हत्ती, उंट, सिंह ह्यांची चित्र होती तर काहींवर सिंड्रेलाची.

बाबांनी मला दोन पुस्तकं निवडायला सांगितली. मी अशी पुस्तकं निवडली ज्याची चित्र मला फार आवडली. ती कोणी लिहिली आहेत, कोणत्या विषयांवर लिहिली आहेत ह्याच्याशी माझे काही देणे घेणे नव्हते. त्यावेळी बाबा काहीच बोलले नाहीत. घरी आल्यावर मात्र त्यांनी मला विचारले की मी ती पुस्तक का निवडली ?? मी म्हणाले काही नाही त्याची चित्र बघा ना किती छान आहेत ती चित्र मला खूप आवडली म्हणून ती निवडली.

असच काहीस माणसांच्या आयुष्यात घडतं नाही. आपण माणसांचे चेहरे बघून त्यांची निवडत करत असतो. त्यांच्याशी मैत्री करत असतो, नाती जोडत असतो, त्यांच्या मनात काय विचार चालू आहे हे कधी डोकावून पहावे अस वाटतच नाही आपल्याला. त्यांचा पेहेराव, त्यांचा चेहरा, त्यांच ते शुगर coated बोलणे हे पाहूनच त्यांच्या बद्दल एक मत बनवून टाकतो.

आणि जसं पुस्तकं वाचायला सुरुवात केल्यावर आपल्या लक्ष्यात येत की, पुस्तक अजिबात वाचनीय नाही. तसं काहीसं माणसांच्या बाबतीत होत. एखाद्याचा चेहरा इतका प्रेमळ, दयाळू, सोज्वळ सज्जन असतो अगदी gentleman वाटतो. पण प्रत्यक्षात तो तिरसट, क्रूर, रागीट असतो. अति गोड बोलणार माणूस आतून किती धूर्त, लबाड आहे हे कळतच नाही आपल्याला.

फरक फक्त इतकाच असतो की पुस्तकं आपण न वाचता, आवडले नाही म्हणून ठेऊ शकतो.पण नाती नाही हो वगळता येत. ती निभावून न्ह्यावी लागतात.

पण काही वेळा असं ही होत की, पुस्तक चांगल की वाईट आहे हे आपल्याला काही पानं वाचल्यावर लक्ष्यात येतं, एखाद्या पुस्तकाला लेखकांनी अचानक यू टर्न दिलेला असतो. आपण हे पुढे आता अस होईल अस काहीतरी विचार करत असतो पण लेखकाने काहीतरी वेगळेच लिहिलेले असते… आपल्याला वाटत असतं की ह्यातला नायक किती रागीट आहे, तो आता तिचा शेवट करणारच पण पुढे वाचल्यावर कळते की तो असा का बनला. हां काही पुस्तक अपवाद आहेत म्हणा.

माणसांच्या मनांत नक्की काय चालू आहे हे आपल्याला त्याला समजून घेतल्याशिवाय कळत नाही. त्याचा स्वभाव असा का बनला हे आपल्याला त्याची बाजू समजून घेतल्याशिवाय कळत नाही.

त्याच्या सहवासात काही दिवस घालवावे लागतात त्याच्या मनात उतरून स्वतः ला त्याच्याजागी ठेऊन विचार करावा लागतो तेव्हां कुठे थोडे कळते.

खूप जणांना सवय असते एखाद्या बद्दल पट्कन मत बनवायची. खूप जणांना असं वाटतं की आपण माणसे परफेक्ट ओळखू शकतो. पुस्तकांची cover बघून त्यातली गोष्ट ओळखू शकतो, अगदी तशी. पण आपण स्वतःला तरी कितपत ओळखतो ही आपली एक शंका आहे मला.

आपण स्वतः च्या चेहर्‍यावर, मनांवर cover घालण्यात इतके बिझी असतो की आपल्याला ही कळत नाही की किती थर चढले आहेत. कधी अहंकाराचा, तर कधी लोभाचा, कधी दुःखी नसताना आपण किती दुःखी आहोत हे दाखवण्याचा तर कधी खूप कष्ट, अपमान, हाल सहन करूनही सुखी असण्याचा.काही वेळेला आपल्याला जाणून बुजून cover घालावे लागते आपल्या मनावर, चेहर्‍यावर.

मित्रानो मला पुस्तकं घेतांना ही जाणवलेली गोष्ट मी आज तुमच्या समोर मांडली.. माझं फक्त एवढेच म्हणणे आहे की कोणाही बद्दल पट्कन मत बनवू नका. दोन्ही बाजू समजून घ्या. पुस्तकाच cover बघून जसं पुस्तक निवडायचे नसते तसच माणसाचा चेहरा बघून त्याला निवडू नका.

 

©  सौ. श्रेया सुनील दिवेकर

मो 9423566278

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मी एक मतदार… अनामिक ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? विविधा ?

मी एक मतदार… अनामिक ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित

आजोबांनी कष्ट करून विकत घेतलेली, कसलेली, माझ्याच आज्याची शेती माझ्या बापाच्या नावावर करावी म्हणून तलाठी सज्जात गेलो . . .

तलाठ्यानं सांगितलं –

काम करू पण,

देणार किती ?

मला वाटलं शेती आमची,

बाप माझा,

आजा माझा.

मग याला का पैसे द्यायचे ?

 

तलाठ्याची तक्रार करावी म्हणून पोलिस स्टेशनला गेलो.

पोलीस म्हणाले –

 गुन्हा दाखल करू, तपास करू पण . . .

आमच्या चहा पाण्याचं काय ?

 

मला पुन्हा राग आला.

यांना तर, सरकार म्हणजेच मी पगार देतोय मग पुन्हा हे चिरीमिरी का मागत असतील.

 

म्हटलं हे आमदारांच्या कानावर टाकू,

आमदार म्हटले . . .

 त्याची गडचिरोलीला बदली करू,

त्याला निलंबित करू,

मंत्र्यांना भेटू पण . . .

वजन ठेवल्या शिवाय फाईल पुढं जातच नाही.

 

मला वाईट वाटलं.

यांना तर मी मतदान केलं होतं.

 

वाटलं कोर्टात जाऊ . . .

गेलो.

तिथं गेल्यावर कळलं की,

तिथं एक आज-उद्या मरेल अशी म्हतारी आली आहे.

 

तिच्यावर तरुणपणी अत्याचार झाला होता. त्या मॅटरची तारीख होती.

अजून निकाल लागला नव्हता.

शिवाय निकाल कसा लागेल याची खात्री नव्हती.

 

म्हटलं हे एखाद्या . . . पत्रकार,

लेखक,

कवीला सांगावं . . .

मन हलकं करावं ! आपल्या प्रश्नांना ते आवाज देतील.

 

तिकडे गेलो s s

तर सगळेच म्हणाले,

पेन आमच्या हातात असला तरी,

त्यातली शाई आम्ही विकली आहे.

आम्ही तसं लिहू शकत नाही.

आमचे हात अन . . .

पेन बांधलेले आहेत.

 

मला याचा प्रचंड राग आला होता.

म्हणून एका साधू कडे गेलो.

वाटलं तेवढीच आत्मशांती मिळेल.

मठावरचे सेवेकरी म्हणाले . . .

उद्या या !

 

सध्या भाऊसाहेब,

 P I साहेब,

आमदार साहेब,

पत्रकार साहेब,

लेखक,

कवी आले आहेत.

महाराज त्यांच्यासोबत बिझी आहेत,

नंतर . . .

त्यांच्या सोबत जेवायला बसणार आहेत.

आज ते तुम्हाला टाईम देणार नाहीत.

 

अखेर एक भक्त भेटला, म्हणे भाऊ

पेपर बिपर वाचतोस कि नाही…

प्रवाहाविरुद्ध  जायच नाही..

गंध नाही; तावीत नाही; धागा नाही…

कुठलाही झेंडा  नाही…

…अस चालणार नाही

पुस्तकातल  पुस्तकातच बरं…

आजा , जमीन तुझी असली तरी देशाचं ;धर्माच अन् देवाचं देणं द्यावच लागेल…

 

माझा सगळ्यांवरचा विश्वास उडाला होता.

म्हटलं जनतेच्या दरबारात जाऊ …!

 

लोकांसमोर गेलो, लोकांना हे सांगितलं.

लोकं म्हटली हा येडा झालाय् . . . . .

हल्ली काही बरळतोय् !

नंतर कळलं . . .

लोकं गुलाम झाली आहेत !

लाचार झाली आहेत !

 

क्षणभर वाईट वाटलं.

 

मी करणार तरी काय होतो.

 

त्यांच्यात सामील व्हावं कि मरावं ?

कि मारावं यांना . . .

😢 😢 ज्यांनी लिहिले त्यांना सलाम

 

– मी एक मतदार !

(या देशाचा मालक)

संग्राहक – श्री सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ उत्कट…. भाग – २ ☆ श्री अजित देशमुख ☆

? विविधा ?

☆ उत्कट…. भाग – २ ☆ श्री अजित देशमुख ☆

( …बीट मार्शलना वायरलेस मेसेजने अॅलर्ट करतो…आता इथून पुढे )

—मुलाची आई रस्त्याकडे हताशपणे पहात आसवं गाळीत असते. वडील आपला मुलगा लहान असला तरी कसा हुशार आहे , पूर्ण नांव , पत्ता सांगू शकतो हे पोलिसांना सांगून हा  प्रकार  काही क्षणात कसा झाला हे समजावत  अशा गर्दीत त्याला कडेवर न घेतल्याबाबत पश्चाताप करत  बसतात.

तेवढ्यात चहावाला पोऱ्या येतो. तो सगळ्यांना ” कटिंग” वाटत असताना  ड्यूटी ऑफिसर  त्या दोघानाही चहा द्यायला खुणावतो. मुलाचे वडील नको नको म्हणत ग्लास उचलतात तरी. आई त्या चहाला होही म्हणत नाही आणि नाहीही. समोर असून चहा तिला दिसत नसतो.  त्याक्षणी तिला  फक्त आणि फक्त तिच्या हरवलेल्या बाळाचा निरागस चेहेरा दिसत असतो.

ड्युटी ऑफिसर , लागून हद्द असलेल्या पोलीस ठाण्यात स्वतः फोन लावून हरवलेल्या मुलाबाबत माहिती कळवून असा कोणी मुलगा आढळून आल्यास ताबडतोब कळवायला सांगतो.

काही पोलिस ठाण्यांच्या हद्दी इतक्या अस्पष्ट असतात की विचारता सोय नाही. रस्ता एका पोलिस स्टेशन कडे तर फुटपाथ दुसऱ्या पोलिस स्टेशन कडे असा प्रकार. त्यामुळे अगदी हद्दीच्या टोकावरील ठराविक ठिकाणाला एखादे पोलिस ठाणे काही पावलावर असले तरी, ते ठिकाण त्या पोलिस ठाणे हद्दीत असेलच असे नाही. अशा ठिकाणी हरवलेले मूल सापडले की नागरिक पोलिस स्टेशनच्या हद्दीचा विचार न करता साहजिकच जवळच्या पोलिस ठाण्यात मुलाला पोहोचवतात.

ड्यूटी ऑफिसर् शेजारच्या पोलिस ठाण्याशी बोलत असताना पलीकडे फोनवर त्याचाच बॅचमेट असला की मग त्यांच्यात कामाव्यतिरिक्त  इतर माफक गप्पाही ओघाने होतात .   एखादी “अरे, कालची गंमत ” वगैरे संभाषण चालू असते.     इथे व्याकूळ आईचा धीर आणखी सुटत असतो. तिच्या चेहेऱ्यावर फक्त तिच्या बाळाचा ध्यास स्पष्ट दिसत असतो. पोलिस स्टेशनचा फोन सतत खणखणत असतो. प्रत्येक वेळा फोनची घंटा वाजली की आपल्या बाळाची खबर असणार या आशेने डोळ्यात आणि कानात प्राण आणून ती फोन कडे पाहाते. 

मधेच इतर कामाबद्दल काही लिहित असलेल्या ड्यूटी ऑफिसरचा , लिहिता हातही आपल्या दोन्ही हातानी धरून हलवत ती आई , ” साहेब बघा ना जरा कुठे गेला असेल तो!” असं शब्दा शब्दाला वाढत जाणाऱ्या रडवेल्या स्वरात विनवते. सगळं काम सोडा आणि आधी माझ्या मुलाला

शोधा ही तिची स्वाभाविक अपेक्षा असते.

असाच काही काळ जातो.

आणि शेजारच्या पोलिस स्टेशन मधून अपेक्षित फोन येतो.  अमुक अमुक बीट चौकीमधे कुणा एकाने ,गर्दीत एकटा रडत फिरणारा , चुकलेला अमुक वर्णनाचा मुलगा आणून पोहोचविला आहे . 

” मिळाला आहे मुलगा तुमचा ” , फोन खाली ठेवत ड्यूटी ऑफिसर त्या दोघांना सहजपणे सांगतो. 

” कुठे आहे हो! कसा आहे? ठीक आहे ना हो ?”

आईला पुन्हा  रडू फुटतं.

चुकलेले मूल पोलिस ठाण्यात कुणी सहृदयी नागरिकाने आणून दिल्यानंतर त्याचे पालक मिळेपर्यंत पोलिस स्टेशन मधे त्या मुलाची काळजी महिला पोलिस घेतात.आईच्या आठवणीने अखंड रडत असलेल्या त्या छोटया जीवाला सांभाळणे सोपे नसते. कडेवर घेऊन  पोलिस स्टेशन भोवती फिरवत  चॉकलेट , बिस्किट्स वगैरे खाऊ देऊन “बच्चू हे बघ , बच्चा ते बघ ” करत त्याचं चित्त जाग्यावर ठेवायची त्यांची कसरत सतत चालू असते.

ड्यूटी ऑफिसर जीप रवाना करतो. थोड्याच वेळात या नाट्याचा बालनायक महिला पोलिसाच्या कडेवर  पोलिस ठाण्यात येतो.

त्या क्षणी त्याच्या आईची अवस्था काय वर्णावी !

रडता रडता ती धावत जाऊन त्याला खेचून घेते. तिचे पिल्लुही  तिला बिलगते. ती त्याला  कवटाळते. अचानक अतिप्रेमाने त्याला बोल लावत  मारतही सुटते. पुनः घट्ट जवळ धरते. रडून रडून कळकट झालेल्या त्याच्या चेहेऱ्याचे सारखे मुके घेते.     ” आता कध्धी कध्धी नाही हं असं तुला सोडणार ” असं त्याला समजावत , स्वतः रडत असताना आपल्या पदराने  त्याचा रडवेला चेहेरा पुसत रहाते.

इकडे ड्युटी ऑफिसर, पोलिस कंट्रोल रूम ला फोन करून आधीच्या फोनचा संदर्भ देऊन हरवलेला मुलगा सापडल्याचे आणि पालकांच्या ताब्यात दिल्याचे कळवून , त्या प्रमाणे पोलिस स्टेशन डायरी  आणि संबंधित रजिस्टर मधे नोंद घेण्यास सुरूवात करतो.

आई आता सावरलेली असते.

एखादा पांडा जसा झाडाला हातांचा आणि पायांचा विळखा घालून असतो , तसच ते मूल गळ्यात हात टाकून आईला धरून असतं.    

पोलिस कर्मचारी मुलाची करमणूक व्हावी म्हणून त्याच्याशी हास्यविनोद करत असतात.

आईवडील आणि मूलही आता हसत असतात.

आयुष्यभर लक्षात राहील अशा घटनेची  आठवण मनाशी बांधून निघताना  आई ड्यूटी ऑफिसरच्या किंवा  या प्रसंगाचे साक्षी असलेल्या एखाद्या वयस्क  हवालदारांच्या पाया पडायचा प्रयत्न करते.

मुलगा चांगला तीन साडेतीन वर्ष वयाचा , धावता येऊ शकणारा असला तरी , पोलिस स्टेशनमधून निघताना त्याचे पाय जमिनीला लावू न देता , आई त्याला कडेवर घेऊनच आनंदाश्रूना मोकळी वाट करून देत , आपल्या घरची वाट धरते .    

एका उत्कट प्रसंगाचा अंक संपतो.

समाप्त

© श्री अजित देशमुख  

9892944007

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ उत्कट…. भाग -१ ☆ श्री अजित देशमुख ☆

? विविधा ?

☆ उत्कट…. भाग -१ ☆ श्री अजित देशमुख ☆

भावनातिरेक आणि अश्रुपात या ठरलेल्या समीकरणाची प्रचिती पोलिस अधिका-याला जेवढी येते तेवढी क्वचितच कोणाच्या अनुभवाला येत असेल. सहन होण्यापलीकडील दुःख आणि मन कोळपून टाकणाऱ्या दु:खाची  परिस्थिती बदलण्याबद्दलची अनिश्चितता यामुळे अशी व्यक्ती क्षणाक्षणाला हतबल होत जाते .

मुळात ” पोलीस” या संस्थेभोवतीचे प्रवाद , समज आणि संशयाची वलये सर्वसामान्यांच्या मनावर गोंदवल्यासारखी घट्ट असतात. पोलिसातील एखाद्या चांगल्या व्यक्तीच्या गुणांबाबत कौतुक करतानाही ”पोलिसात असूनसुद्धा ” हे पालुपद चिकटतं ,  यात सर्व काही आलं .

तक्रार घेऊन आलेली व्यक्ती ही आपले दुःख कमी व्हावे या उद्देशाने  शेवटचा उपाय म्हणून पोलिसांकडे येते . तिची एकमेव अपेक्षा त्याच्या दुःखाच्या समस्येचे तात्काळ निवारण व्हावे अशी असते. पोलीस अधिकारी मात्र तक्रारीच्या स्वरूपाचा  आढावा घेत घेत त्या तक्रारीनुरुप करावयाच्या कायदेशीर प्रक्रियेची मनात जुळवाजुळव करत असतो. त्या त्या प्रत्येक तक्रारीमागील घटनांचे कारण, त्यामुळे होणाऱ्या  परिणामांचे , त्यावर कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांचे , नवीन तक्रारीचे स्वरूप   हातातील काम बाजूला ठेवण्या इतपत तातडी निर्माण करणारे असले, तर वरिष्ठांना तात्काळ कल्पना देण्याबाबत असे एक ना  अनेक विचार त्याच्या मनात  गर्दी करून असतात . याचा परिणाम म्हणून कि काय एखादा डॉक्टर जसा पेशंट तपासताना विचलित होत नाही तसाच पोलीस अधिकारी तक्रारी हाताळताना भावनाविवश होत नाही . मात्र यामुळे होते असे की तक्रारदाराच्या मनातील पोलिसाबद्दलची ‘रुक्ष ‘ अशी प्रतिमा अधिक गडद होते . आपली तक्रार आवश्यक तेवढ्या गांभीर्याने घेतली जात नाही असा गैरसमज होऊन वाढलेली तक्रारदाराची  हतबलता  त्याच्या देहबोलीतून स्पष्ट दिसत असते.

मात्र पोलिस अशाही प्रसंगाचे साक्षी होतात ज्यामध्ये दु:खाश्रूंची जागा थोड्याच अवधीत आनंदाश्रू घेतात.

मुंबईतील गर्दी हा “मुंबई शहर” याविषयामधील  एक अटळ मुद्दा आहे. दक्षिण मुंबईतील व्यापारी भागात तर दिवसा चालता येणं मुश्किल होते इतकी गर्दी असते. अशा भागात दिवसा वाहनांचे किरकोळ अपघात सतत घडत असतात.  मजेची बाब अशी की रविवारी त्याच रस्त्यावर “तरुण मुले क्रिकेट खेळून दंगा करत आहेत” अशा तक्रारीही पोलिसांकडे येतात. गर्दी आली की त्या अनुषंगाने येणाऱ्या गुन्ह्यांचे आणि घटनांचे प्रकारही आलेच. पाकिटमारी, बॅग खेचून पळुन जाणे, कपडयावर घाण टाकून  धुण्यासाठी मदत करावयाच्या बहाण्याने बाजूला नेणे आणि बॅग खाली ठेवून आपल्या शर्टावरची घाण धुण्यात दंग असलेल्या मालकाला घाणी बरोबरच आपली बॅगही नाहीशी झाल्याचा दृष्टांत होणे हे नित्याचेच.

अशा गर्दीचे कार्यक्षेत्र असलेल्या पोलिस ठाण्यामधे, एखादी स्त्री कपड्याचे भान न ठेवता  घाईघाईने पायऱ्या चढत , रडून दमेलेले डोळे शोधक नजरेने फिरवत पोलिस ठाण्यात प्रवेश करते तेव्हा समजावे, हीचे मूल गर्दीत हरवले आहे.

“साहेब माझा मुलगा हरवला आहे हो !” असं बोलून मागोमाग मोठयाने हंबरडा .

हरवलेल्या मुलाचे वडील बरोबर असले तर बाहेर टॅक्सीचे पैसे देऊन मागोमाग पोलीस ठाण्यात येतात. तेही काळजीत असतात परंतू पुरुष असल्यामुळे त्यांचे डोळे वाहात नसतात. बाळाच्या विचाराने आईचे लक्ष कशातच नसते.  तिच्या संपूर्ण चेहऱ्यावर काळजी पसरलेली आणि मनात येणाऱ्या नाही नाही त्या शक्याशक्यतांच्या विचारांमुळे तिच्या डोळ्यातून सतत अश्रूंचा पूर लोटत असतो . ड्युटी ऑफिसरने बसायची खूण केली आणि बाळाचे वडील खुर्चीत बसले तरी आई खुर्चीत बसत नाही.

गर्दीत हात सुटून हरवलेली अशी मुले सर्व साधारणपणे अडीच ते चार वर्षाची असतात.

नित्याचा प्रकार असल्याने , ड्युटी ऑफिसर हरवलेल्या मुलाच्या वयाची , त्याच्या अंगावर असलेल्या कपड्यांची आणि शरीरावरील ओळखीच्या खुणांची तोंडी चौकशी करता करता हातातील लिखाण पुर्ण करत असतो. मुलाच्या आईवडीलांसाठी परिसर सरावाचा नसल्याने नेमक्या

कोणत्या जागेवरून मुलगा हरवला हे त्याना नीट सांगता येत नाही .मग एखादया मोठया दुकानाच्या खुणेवरून वगैरे त्या जागेचा अंदाज येतो.      

बाळाची आई रडत रडत “एक मिनिटांसाठी  घोटाळा झाला हो” हे वारंवार उच्चारत मुलाचा हात सोडल्याबद्दल स्वतःला दोष देत  असते.

एक छोटेसे टिपण करून त्याची  “लहान मुले  हरवल्याबाबतच्या” रजिस्टर मधे आणि पोलिस स्टेशन डायरी मधे नोंद करून, ड्युटी ऑफिसर पोलिस कंट्रोल रूमला घटना कळवतो.

त्याचप्रमाणे आपल्या पोलिस ठाणे हद्दीतील संबंधित क्षेत्रात गस्तीवर असलेल्या बीट मार्शलना वायरलेस मेसेजने अलर्ट करतो…

क्रमशः…

© श्री अजित देशमुख  

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आधार… ☆ सौ. पल्लवी ऋषिकेश कुलकर्णी ☆

सौ. पल्लवी ऋषिकेश कुलकर्णी

? विविधा ?

☆ आधार… ☆ सौ. पल्लवी ऋषिकेश कुलकर्णी ☆

आधार हा शब्द इतका सोपा आहे का? कोणाचा आणि कशाचा आधार वाटावा हे प्रत्येकाच्या नजरेतून आणि विचारातून वेगवेगळा असू शकतो. म्हणजे त्याची व्याख्या करणे कठीण आहे ना. पण आधार वाटावा ही भावनाही खूप सुखद आहे. ते मला जास्त भावते. प्रत्येकाला आधार हा हवा असतो पण स्वतःचा अहंम आड येतो. काहीजण खरच मान्य करतात की खरच आधार हा माझ्यासाठी खूप मोठे काम करतो माझ्या आयुष्यात. पण अशी ही काही लोक असतात त्यांना आधार हवा असतो पण त्यांना तो दाखवायचा नसतो. समोरून आधाराचा हात आला तरी तिथे त्यांचा अहंम आड येतो. अशी लोक मला खूप केविलवाणी वाटतात आणि मग त्यांच्यासाठी जिव कळवळतो पण ते ही त्यांना कळत नाही. हे असे का व्हावे हे कळत नाही पण असे असू नये असे माझे निर्मळ मत आहे. हे मान्य आहे की आपल्या कमकुवत बाजूचा लोक गैरफायदा घेतील ही पण मनात एक भीती असते. पण त्यावेळेला हे तरी विचारात घेण्यासारखे असते की आधार देणारा हात कोणाचा आहे. आणि प्रत्येक वेळेला आधारासाठी पुढे आलेला हात हा काही स्वार्थ मनात ठेऊनच आधार देत नसावा. त्याच्या मागे त्याचे निर्मळ मन न दिसावे ही खंत आहे. आणि कदाचित आधाराला पुढे येणारा हात हा मैत्रीचा असू शकतो किंवा त्याला पण तुमच्यातला चांगुलपणाची जाणीव असावी म्हणून पुढे येत असेल? खूप मोठे प्रश्न चिन्ह आहे माझ्या मनात???

आधार हा खूप गोष्टीं मधून मिळू शकतो. तो शब्दातून मिळतो, स्पर्शातून मिळतो किंवा निव्वळ नजरेच्या एक कटाक्षात पण आधार असतो. किती छान भावना आहे खरं तर ही… सोपी निर्मळ निस्वार्थी… ज्याला आपली गरज आहे त्याच्या पाठीशी नाहीतर त्याच्या सोबत राहणे आणि त्याच्या बरोबरीने त्याला साथ देणे.

प्रत्येक वेळेला पैसा हाच आधाराचा मुद्दा नसतो ना? नुसते…. मी आहे ना…. हे शब्द ही खूप समाधान देऊन जातात. मनातला एक कोपरा त्याने चिंब भिजून जातो… ओलावा वाढतो… मनाची ताकत वाढवतो.

आधार घेणे किंवा मागणे हे कमीपणाचे असूच शकत नाही. खूप निर्मळ संवेदना आहे ही जी एकाच्या मनात दुसऱ्या बद्दल निर्माण होते. आधार देणारा हा मनाने खंबीर असतो पण प्रत्येक वेळेला नाही होत असे. समोरच्यावर जीव ओवाळून टाकताना आधार देणारा हा मनाने खचला असला तरी त्या समोरच्या माणसाला आधार देतोच ना…

आधार या भावनेला वयाचे बंधन नसतेच मुळी. आपल्या लहान बाळाच्या प्रांजळ नजरेचा त्याच्या स्पर्शाचा ही आपल्याला कधी कधी आधार असतो जगण्याची उमेद देतो. आपण पण तो आधार खूप प्रामाणिक पणे मान्य करायला शिकायला हवे.

खऱ्या मित्र मैत्रिणीच्या मैत्रीला पण आपण आधारच म्हणतो ना… राधेला कृष्णाच्या बासरीच्या सुरांचा आधार मान्य करतो… वारकऱ्याला वारी मध्ये विठ्ठलाच्या भक्तीचा आधार असतो. बुडत्याला काठीचा आधार अशी म्हण पण मराठीत आहेच की… अशी किती पैलू आहेत आधार या शब्दाला.

देव आहे की नाही हा मुद्दा मला इथे मांडायचा नाहीये तो विषयच नाहीये माझा कारण मी कामालाच देव मानते आणि त्याच्याशी खूप प्रामाणिक राहते. हीच माझी देवाबद्दल श्रद्धा आहे. प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या रूपाने तो देव सापडतो आणि त्याची श्रद्धा पण तो मनात बाळगत असतो. मग ही श्रद्धा म्हणजेच आधार आहे का? हा विचार माझ्या मनात रुंजी घालतोय आणि असे वाटते खरंच ही देवावरची कामावरची श्रद्धा म्हणजे पणआधारच आहे. आपण  त्या देवावर कामावर विश्वास ठेवतो आणि जगणे आनंदी व्हावे म्हणून आपण नकळत किंवा जाणून बुजून त्याचा आधारच घेत असतो.

© सौ. पल्लवी ऋषिकेश कुलकर्णी 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ सापडला की गुलाम…अनामिक ☆ प्रस्तुती – सौ.स्मिता पंडित ☆

? विविधा ?

☆ सापडला की गुलाम…अनामिक ☆ प्रस्तुती – सौ.स्मिता पंडित ☆

मी पेपर उघडला,,!!

त्यात  मीच दिलेली

जाहिरात होती,,😊

 

हरवला आहे .. “आनंद “

पत्ता विसरण्याचा त्याला आहे छंद …😊

 

रंग … दिसेल तो

उंची ..भासेल ती,,😊

 

कपडे सुखाचे

बटण  दुःखाचे,,,!!

 

कुणाला न सांगता घरातून गेला आहे निघून

थकलो आहोत सगळीकडे शोधून,,,!!

 

“आनंदा  ” परत ये,,,

कुणीही तुझ्यावर रागवणार नाही,,

तुझ्यावर  कसलीही सक्ती करणार नाही,,👍

 

घरातले सगळे आसुसून बघताहेत तुझी वाट

दार उघडं ठेवलंय वाढून ठेवलंय आशेचं  ताट,,👍

 

शोधून आणणाऱ्याला दिलं  जाईल इनाम

मग म्हटलं आपणच करावं हे  काम,,😊

 

काय आश्चर्य .. सापडला की गुलाम ..👌😊

 

एका नव्या कोऱ्या पुस्तकाआड,,

एका जुन्या गाण्याच्या अर्थाच्या पल्याड,,👌

 

आठवणींच्या मोरपिसात,,

अगरबत्तीच्या मंद वासात,,👌

 

मोगऱ्याच्या  मखमली स्पर्शात …

अवेळी येणाऱ्या पावसात,,👌

 

त्यानेच मारला पाठीत धप्पा,,

जुन्या मैत्रिणीशी मारताना गप्पा,,😊

 

मी म्हटलं अरे , इथेच होतास ,उगाच दिली  मी जाहिरात

तो म्हणाला वेडे असता तुम्ही माणसं,,😊

 

बाहेर शोधता .. .मी असतो तुमच्याच मनात … !👌💝🎊

 

लेखक – अज्ञात

संग्राहिका – सौ. स्मिता पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ विचार–पुष्प – भाग 16 – मी कोण होऊ? ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆

डाॅ.नयना कासखेडीकर

?  विविधा ?

☆ विचार–पुष्प – भाग 16 – मी कोण होऊ? ☆ डाॅ.नयना कासखेडीकर 

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका विचार–पुष्प.

आपल्याकडची सामाजिक परिस्थिति बघून नरेंद्र ने सामाजिक कामात लक्ष घालायचे ठरवले होतेच .त्याप्रमाणे शहरातील सामाजिक घडामोडींवर तो लक्ष ठेऊन होता. यावेळी ब्राह्मो समाजाचे काम पण सुरू झाले होते. हिंदू धर्मातील बराचसा भाग कालबाह्य रूढीवर आधारलेला होता. असे दिसत असले तरी आधुनिक काळात उपयोगी असलेल्या अशा पुष्कळ गोष्टी भारतीय अध्यात्मविचारात होत्या. आणि पश्चात्यांकडच्या चांगल्या गोष्टी आपण स्वीकाराव्यात अशाही होत्या. त्या समाजाला माहिती करून देणं आवश्यक होतं.

मग राजाराम मोहन राय यांनी सुवर्ण मध्य काढून ब्राह्मो समाज स्थापन केला. इथे पारंपरिक धर्मात सुधारणा करण्याचा उद्देश होता. धर्म सुधारला तर आचरण सुधारेल, आचरण शुद्ध झाले तर, सामाजिक प्रगतीचा पाया घातला जाईल. पुढे पुढे अनेक सुधारणा व कार्य या ब्राह्मो समाजाने केलं. त्यात जातीभेद निर्मूलन, सर्व मानव समानता, स्त्री शिक्षणाला महत्व, विवाहाची वयोमार्यादा वाढवणे, मिशनर्‍यांच्या कार्याला आळा घालणे अशी कामे होत होती. पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर, केशवचंद्र सेन हे तरुणांच्या स्फूर्तीस्थान बनले होते.

ब्राह्मो समाजाचे काम नरेंद्रला आवडत होते. सामाजिक सुधारणा या उद्दिष्टामुळे तो याकडे आकर्षित झाला होता. पण त्याची अध्यात्माची ओढ तशीच कायम होती. ती कमी नाही झाली. ईश्वर विषयक जिज्ञासा पण कायम होती. उलट जस जसे वाचन होत होते, अनुभव मिळत होता तसतसे त्याची चिकित्सक वृत्ती जास्तच धारदार झाली होती. कारण त्याच्या अंत:करणात अध्यात्मिकतेचा नंदादीप लहानपणापासून सतत तेवत राहिला होता. याही काळात त्याची ध्यानधारणा चालूच होती.

रोज रात्री अंथरुणावर पडल्यावर त्याला आपल्या भावी जीवनाचे प्रश्न सतावत असत. जीवनात आपण काय करावयाचे? कोण व्हायचे? आपल्याला काय साध्य करायचे आहे ? आणि मग त्याच्या डोळ्यासमोर याचे उत्तर म्हणून दोन चित्रं उभी राहत. एक म्हणजे, लौकिक जीवनात सर्वार्थाने यशस्वी आणि कीर्तीमंत झालेला कर्तृत्ववान पुरुष. ज्याच्याकडे उत्तम ज्ञान आहे, समाजात ज्याला श्रेष्ठ स्थान आहे. सत्ता अधिकार आहे. पायाशी लक्ष्मी दासी होऊन उभी आहे. असा यशस्वी पुरुष.

आणि दुसरे चित्रं म्हणजे, याच्या अगदी उलटे. अंगावर भगवी वस्त्रे घालून हातात दंड, दुसर्‍या हातात कमंडलू, निर्मोही, निर्लेप आणि तृप्त वृत्तीने संचार करणारा सर्वसंगपरित्यागी सन्यासी. आपण संकल्प केला  तर असा सन्यासी होऊ शकू. ते आपल्याला शक्य आहे अशी त्याला खात्री पण वाटत असे. संन्यासी का यशस्वी पुरुष? असा प्रश्न आलटून पालटून त्याच्या मनात सतत येत असायचा. असा विचार करता करता केंव्हा झोप लागायची ते कळायचेही नाही.

“शय्या भूमितलं दिशो~पि वसनं ज्ञानामृतं भोजनं” असे भर्तृहरींनी वर्णन केल्याप्रमाणे, ‘भूमी हीच शय्या, मोकळ्या दिशा हेच अंगावरील वस्त्र, आणि अमृतरूप आत्मज्ञान हेच भोजन’. असा पूर्णकाम संन्यासी एक साक्षात्कारी पुरुष असतो. साक्षात्कारी पुरुष म्हणजे ज्याला ईश्वराचे दर्शन झाले आहे तो. नरेंद्रला वाटे ईश्वर दर्शनाचा मार्ग कोण सांगू शकेल? ज्याला स्वताला ईश्वराचे दर्शन झाले आहे तोच आणि इथेच त्याच्या मनात तीव्र इच्छा निर्माण होई की, आपल्याला असे सांगणारा कोणीतरी भेटावा ज्याने देव पहिला आहे. अशी तळमळ त्याला सतत अस्वस्थ करीत असे. जे अधिकारी व श्रेष्ठ असे भेटत त्यांनाही तो जाऊन थेट प्रश्न विचारात असे. हे जाणून घ्यायला तो व्याकुळ व्हायचा.

याच वेळी नरेंद्रच्या लग्नासाठी विषय सुरू झाला होता. भुवनेश्वरी देवी आणि विश्वनाथ बाबू यांनी नरेंद्रला सर्व प्रकारे सांगून बघितले, चांगली स्थळ आणली. अनेक विद्वान व वडीलधार्‍यांनी समजाऊन सांगितले. पण नरेंद्रचा विवाहाला नकार कायम होता.

या वयात आपल्या आयुष्याचा इतका गंभीर पणे विचार करणे खरच किती आश्चर्याची गोष्ट होती. आजचा ग्रज्युएट होत असलेला तरुण आज त्याच्या आयुष्याच्या अशा वळणावर काय विचार करतो ? भविष्याबद्दल त्याला काही अंदाज बांधता येतात का? असा विचार मनात येतो.

© डॉ.नयना कासखेडीकर 

 vichar-vishva.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आंतरराष्ट्रीय रेडक्राॅस दिनानिमित्त – रेडक्रास सोसायटी ☆ डाॅ.ए.पी.कुलकर्णी ☆

डाॅ.ए.पी.कुलकर्णी

? विविधा ?

☆ आंतरराष्ट्रीय रेडक्राॅस दिनानिमित्त – रेडक्रास सोसायटी ☆ डाॅ.ए.पी.कुलकर्णी

कांही वर्षांपूर्वी प्रत्येक रूग्णवाहिकेवर तसेच डाक्टरांचे वाहनांवर रेडक्रास असावयाचा. डाक्टर वा अॕम्ब्युलंस चटकन ओळखता ये असे.

त्याच रेडक्रास बद्दल आज माहिती करून घेऊया.

आज ८मे जागतिक रेडक्रास दिन म्हणून साजरा केला जातो.

रेडक्रास या संस्थेची स्थापना हेन्री ड्युरंट यांनी (१८2८-१९१०)जिनेव्हा येथे केली.

यांची जन्मतारीख ८मे आहे. त्यांच्या स्मृती निमीत्त हा दिवस जागतिक रेडक्रास दिन म्हणुन साजराकेला जातो.

युध्दात जखमी, आजारी सैनिकांना कोणताही भेदभाव न करता योग्य ती मदत करणे हे या संस्थेचे मुख्य काम आहे.

ही संस्था स्थापण्या पुर्वी सुमारे १५८६ मध्ये जखमी सैनिकांना उपचार वा शुश्रूषा करणे साठी (फादर्स आॕफ गुडक्राॕस) स्थापन केली होती. याच सुमारास फ्रान्सचे सत्ताधारी ४थे लुईस यानीही शत्रू सैनिकांना ही चांगली वागणूक द्यावी असा आदेश दिला होता.

रेडक्राॕस संस्था स्थापण्या पूर्वी फ्लाॕरेंस नाईटिंगेल या परिचारिकेने युध्द भुमीवर जाऊन जखमी सैनिकांची सेवा शुश्रूषा केली होती.

२४जून १८५९ ला फ्रेंच व इटाली ही राष्ट्रे आणि आॕस्ट्रिया यांच्या मध्ये युध्द झाले. या युध्दात जवळपास चाळीस हजार सैनिक मृत झाले होते. जखमी सैनिकांची संख्याही खूप होती. जखमी सैनिकांकडे होणारे दुर्लक्ष व अनास्था पाहून हेन्री ड्युरंट खूप दुःखी झाले.

लढाईच्या जवळच्या गावातील चर्च मध्ये तात्पुरते रूग्णालय उभे करून सैनिकाना जमेल तेवढी मदत केली.

सन १८६२ मध्ये या कटू आठवणी लिहल्या. धर्म, जात, पंथ नागरीकत्व यात भेद भाव न करता या पीडीत सैनिकाना कशी मदत करता येईल असा विचार त्यांच्या मनात आला. या विचारांना संपूर्ण युरोप मध्ये अभुतपूर्व प्रतिसाद मिळाला.

हेंन्री ड्युरंट व आणखी पाच स्वीस नागरिकानी समिती स्थापन केली.

या समितीसच आंतरराष्ट्रीय रेडक्राॕस समिती असे ओळखू लागले.

या नंतरच्या काळात थोर स्वीस मानवतावादी ड्युरंट हेन्री यानी रेडक्राॕस या संस्थेस संघटीत स्वरूप व स्थैर्य प्राप्त करून दिले म्हणूनच त्याना रेडक्राॕस चळवळीचे जनक मानले जाते.

आॕगष्ट १८६3 वर्षी झालेल्या बैठकीत संस्थेची मूलतत्वे व बोधचिन्ह निश्चित केले.

मूल्ये…

  • दोन्हीही बाजूंच्या सैनिकांची तटस्थ पणे देखभाल करणे.
  • मानवी हालअपेष्ठा कमी करून जीविताचे व आरोग्य रक्षण करणे.
  • परस्परातील सामंजस्याने सहकार्य करून शांतता वाढवणे.
  • देश नागरिकत्व ,धर्म ,लिंग असा भेदभाव न करता मदत करणे.
  • संस्थेची स्वायतत्ता अबाधित राखून ठरावा नुसार काम करणे.
  • कोणत्याही लाभाची अपेक्षा न ठेवता काम करणे.
  • एका देशात एकच रेडक्राॕस संस्था देशभर कार्य करेल.
  • जबाबदारीने कर्तव्य पार पाडणे
  • सर्व गरजू लोकाना मदत करणे

बोधचिन्ह …

पांढऱ्या शुभ्र रंगावर तांबडा क्राॕस हे अधिकृत बोध चिन्ह आहे.

अधिकृत बोधचिन्ह असलेल्या वाहने, इमारती, व्यक्ती, यांचेवर हल्ला करूनये, मात्र यांचेकडे दारू गोळा, इतर युध्द जन्य सामान असता कामा नये.

युध्द करणाऱ्या राष्ट्रांमध्ये मध्यस्थ म्हणूनही ही संस्था काम करते.

अण्वस्त्रांवर निर्बंध घालण्यासाठी ही संस्था कार्य करते.

ही संस्था युध्दजन्य परिस्थितीत काम करतेच शिवाय भूकंप, महापूर, वादळ, वणवा, इ.

नैसर्गिक आपत्तीत ही संस्था कार्यरत असते.

१९३ देश याचे सदस्य आहेत. सदस्यांनी रेडक्राॕसचे जिन्हीवा संकेत पाळलेच पाहिजेत व बोधचिन्हही वापरलेच पाहिजे.

ही संस्था सर्वोत्तम परिचारिकेस फ्लाॕरेंस नाईटिंगेल नावाने पदक देते.

भारतीय रेडक्राॕस सोसायटी १९२० ला सुरू झाली.

© डाॅ.ए.पी.कुलकर्णी

सांगली

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares