मराठी साहित्य – विविधा ☆ वाढदिवस ☆ सौ. शुभदा भा. कुलकर्णी (विभावरी)

 ? विविधा ?

?वाढदिवस ☘️ सौ. शुभदा भा. कुलकर्णी (विभावरी) ☆ 

— कॅलेंडरची पानं वा-याने फडफडली,ती नीट करतांना लक्षांत आलं ..उद्या वाढदिवस आहे आपला..! त्या तारखेभोवती आतां लाल वर्तुळाची खूण करणार माणूसच नाही आता..मग आता वाढदिवसाच अप्रुपही फारस वाटत नाही.

–तरीही नेहमीप्रमाणेच साखर झोपेत असतांनाच माझ्या वाढदिवसाला, अंजलिच्या म्हणजे आमच्या लेकीच्या -“वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा ग आई..!”

या फोननेच जाग आली.आणि मग दिवसभर नातवंड, जावई, माझी भावंड,मैत्रीणी,यांची शुभेच्छांची बरसातच सुरू झाली.

यानिमित्तानं झालेल्या संवादाच्या आनंदात हा दिवस संपूच नये,असं वाटत राहील ….एक वर्षानं वय वाढलंय आपलं..ही जाणीवही होत नाहीय….

 — खरं सांगायच तर…आयुष्य गिरक्या घेत पुढं सरकलं तरी प्रत्येक वर्षी या दिवसाच्या वळणावर मनं क्षणंभर विसावतच. धुक्याआड गेलेले चेहरे डोळ्यासमोर येतात. ज्यांच्यामुळेआपण आज आहोत, ज्यांचे हात सदैव आपल्या पाठीवर मायेने फिरतात असं वाटत, ते आपले जन्मदाते आईवडील, त्यांचे स्मरण प्रथम होत.अन् नकळत डोळे पाणवतात. स्मृतींचे पंख फडफडूं लागतात. आतांपर्यंत साजरे झालेले-केलेले घरातील सगळ्यांचेच वाढदिवस, -आम्हा उभयतांचे, मुलीचे, नातवंडांचे, सगळे-सगळेच आनंददायी क्षणं,आठवतात. अन् वाटत खरंच…

जीवन किती गतिमान आहे.बालपण, किशोरवयं, तारुण्यं, प्रौढत्व, त्यातून वृध्दत्वाकडे वाटचाल. हा प्रवास चालू असतो. निसर्गाच्या उत्पत्ती, स्थिती, लय, या तत्वाची जाणीवही असते प्रत्येकाला.! ऋतूमागून ऋतू जातात.

हिरव्या पानांचा रंग पिवळा होऊ लागतो.वयाप्रमाणे स्नेही-सोबती बदलत जातात. जुने मागे पडत जातात.नात्या-गोत्यांच रुंदावलेल वर्तुळ थोडं अंतरावरच राहत.अन् मनांत येत..वर्षांनुवर्ष साजरा होणारा वाढदिवस, आतां केवळ उपचार राहीला आहे का?मग वाढदिवसाचा आनंद विरघळू लागतो.भेटकार्डावरच्या शब्दांची भुरळ पडेनाशी होते. फुलदाणीत ऐटीत विसावलेल्या फुलांकडे पाहून, ती उद्या  कोमेजणार याने मनं कोमेजू लागलं तरं योग्य नाही.आपल्या नाठाळ मनाला समजायलाच हवं..आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपण मनाने,बुध्दीने,वयाने परिपक्व होत जातो.आपल्या जगण्याला सकारात्मक दृष्टिकोन देत, कोणत्या गोष्टी टाळायच्या, कोणत्या घेऊन जगणं आनंदाच करायच हे ठरवायचं ते वाढदिवशीच. या वळणावर क्षणंभर विसावतच मागे वळून पाहिलं अन् उत्सवाचे,आनंदीक्षणं, मनाच्या कुपीत हळूंवारपणे जपून ठेवले.नव्या उमेदीने पुढील आयुष्याची वाटचाल करण्यासाठी पाऊलं उचलतांना आतां मनांत वयाचा हिशोब नाही. याक्षणी मनांत फक्त प्रसन्नता झुळझुळतेय. सगळं धुकं विरुन लख्ख कांहीतरी समोर आल्यासारखी..! 

अन् मी कागदावर लेखणी टेकवली….

© सुश्री शुभदा भा. कुलकर्णी (विभावरी)

कोथरूड- पुणे.

मोबा. ९५९५५५७९०८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ जगणे आपुल्याच हाती..! ☆ श्री अरविंद लिमये

श्री अरविंद लिमये

?विविधा ?

☆ जगणे आपुल्याच हाती..! ☆ श्री अरविंद लिमये ☆

मानवीजीवन आजच्या तुलनेत पूर्वीचं चांगलं होतं का? आणि उद्याचं कसं असेल? चांगलं की वाईट? यावर चर्चा होत असताना ‘जुनं ते सोनं’ असं सर्रास ठासून सांगितलं जातं. हे खरं तर मला खूप एकांगी वाटतं.चांगलं म्हणजे काय? जे मनाला भावते, आनंद, समाधान देते ते. मन प्रसन्न करते ते.

इच्छा-आकांक्षा मनाशी बाळगून स्वप्नं पहातच प्रत्येक जण जगत असतो. इच्छापूर्ती मनाला समाधान देते. इच्छा पूर्ण नाही झाली तर अर्थातच मन उदास होते.स्वप्नांचंही तसंच. एखादं स्वप्न मनाशी बाळगून त्या दिशेने वाटचाल सुरू केली की माणूस जिवापाड प्रयत्न, कष्ट करीत रहातो.ध्येयपूर्ती स्वप्न सत्यात उतरल्याचं समाधान देते. प्रयत्न प्रामाणिक नसतील, परिस्थिती अनुकूल नसेल, तर या वाटचालीत येणाऱ्या अपयशामुळं स्वप्नभंगाचे दुःख मनात घर करुन रहाते.

जगण्याचे कांही कालातीत नियम आहेत.पेरल्याशिवाय उगवत नाही आणि जे पेरु तेचं उगवतं हा भूत, वर्तमान, भविष्य या त्रिकाळातील जगण्याला सारखाच लागू पडणारा एक महत्त्वाचा नियम.

मानवी जीवन म्हणजे सुखदुःख, यशापयश, अनुकूलता आणि प्रतिकूलता या साऱ्यांचा पाठशिवणीचा खेळच असतो. आणि इतर खेळांसारखाच हा खेळही खिलाडूवृत्तीने खेळणेच अपेक्षित असते. तरच या खेळातील हार किंवा जीत सारखाच आनंद देते.

काळ भूत, वर्तमान,भविष्य कोणताही असो या जीवन प्रवासाचे नियम सारखेच असतात. त्यामुळे मानवी जीवन भूतकाळात कसं होतं?चांगलं की वाईट याचं उत्तर हे किंवा ते इतकं सरळ साधं असूच शकत नाही. शिवाय मानवी जीवन चांगलं कि वाईट हे आपण आपल्या वर्तमानाच्या तुलनेतच ठरवणार असतो. त्यामुळे आजच्या तुलनेत तेव्हा काय चांगलं होतं किंवा वाईट होतं याचा विचार करणे हे ओघानंच आलं.आणि असं झालं तर त्यातून मिळणारं उत्तर फसवंच असणार.कारण भूतकाळातला ‘मी’ आणि वर्तमानकाळातला ‘मी’ दोन्ही एकच व्यक्ती असूनही परस्पर भिन्न व्यक्तिमत्त्वे वाटावीत इतका जमीन-अस्मानाचा फरक आपल्यात पडलेला असतो. काळानुरूप होत गेलेले, स्वीकारले गेलेले जीवनशैलीतील बदल आता अंगवळणी पडलेले असतात. त्यामुळे घराचं घरपण, नात्यांची घट्ट वीण, आपले प्राधान्यक्रम, खानपानाच्या सवयी, या सगळ्यातच आमूलाग्र बदल झालेला असूनही जर आज मी आनंदात असेन आणि आजच्या सुखसोयी,स्वास्थ्य, आर्थिक सुबत्ता, वैचारिक स्वातंत्र्य, हे सगळं इतक्या मुबलक प्रमाणात तेव्हा नसतानाही तेव्हासुध्दा जर मी आनंदात असेन तर तो आनंद नेमका कशामुळे निर्माण होत होता याचा मूलभूत विचारच आपल्यापुढील प्रश्नाचे नेमके उत्तर शोधायला मदत करू शकेल.

काळ कोणताही असो आपण जगतो कसे यावरच आपल्या जीवनाची गुणवत्ता अवलंबून असते. म्हणूनच मानवी जीवन चांगलं किंवा वाईट हे नेहमीच व्यक्तिसापेक्ष असतं. तरीसुद्धा सर्वांसाठीच आनंदापेक्षाही कृतार्थता जास्त मोलाची असते. आयुष्याच्या संध्याकाळी, मागे वळून पाहताना आपल्या जगण्याचा लेखाजोखा मनोमन मांडत असता जर मनाला कृतार्थ समाधान मिळालं तरच आपलं भूतकाळातलं जीवन चांगलं होतं असं म्हणता येईल.ती कृतार्थता नसेल तर मात्र ते चांगलं असू शकणार नाही.

आपण कसं जगायचं हे आपल्याच हाती असतं. अनुकूल परिस्थिती असूनही जे नाही त्याबद्दल दुःख करत बसणारी माणसं जशी असतात तशीच प्रतिकूल परिस्थितीतही संकटांशी हिमतीने दोन हात करीत जगताना छोट्या छोट्या गोष्टीतला आनंद शोधत, सर्वांना बरोबर घेऊन वाटचाल करताना त्यांच्याही आयुष्यात आनंद पेरीत समाधानानं जगणारी माणसेही असतात. या दोन परस्पर विरुद्ध प्रवृत्ती म्हणता येतील. या प्रवृत्तींनुसार जीवन चांगलं किंवा वाईट असणार हे ओघानंच आलंच. आणि याच दोन्ही प्रवृत्ती भूत, वर्तमान, आणि भविष्यकाळातही असणारच आहेत.

कृतार्थतेचा आनंद मिळवण्यासाठी आयुष्यभर कालातीत महत्त्व असणारी जीवनमूल्ये असोशीने सांभाळणे अगत्याचे आहे. हे जर घडलं तरच आजच्या बालपिढीचं भविष्यकाळातील मानवी जीवन नक्कीच सुखकर, चांगलं असेल. पण त्या जीवनमूल्यांचे संस्कार करण्याची जबाबदारी मात्र आपल्यासारख्या अनुभवाने ‘शहाण्या’ झालेल्या पिढीचीच आहे हे विसरून चालणार नाही. 

 

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ चं म त ग ! साखरभाताची साखर झोप ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक

श्री प्रमोद वामन वर्तक

? विविधा ?

? चं म त ग ! ⭐ श्री प्रमोद वामन वर्तक ⭐

? साखरभाताची साखर झोप! ?

“अगं जरा ऐकतेस का !”

“तुमचच तर ऐकत आले आहे जन्मभर !”

“हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही.”

“मग काय उत्तर अपेक्षित आहे गुरुवर्यांना ?”

“हे s s च ! मी म्हणतोय नां ते हे s s च ! ते व्हाट्स ऍपवर तुमच्या महिला मंडळाच्या “खुमखूमी” ग्रुपवर सारखे, सारखे पुणेकरांवरचे पुणेरी विनोद वाचून, तुझी भाषा जन्माने जरी तू अस्सल गिरगावकरीण असलीस, तरी आता साध्या साध्या प्रश्नांची उत्तर देतांना पण, पुणेरी भाषेत द्यायला लागली आहेस !”

“आता या विषयावर, बेडवर पडल्या पडल्या, रात्री अकरा वाजता माझं बौद्धीक घेणार आहात कां ?”

“अगं, काही जणांची मराठी जशी इंग्राजळलेली असते, तशी तुझीही मराठी आता साधं साधं बोलतांना पण, मुळा मुठेच्या पात्रात डुबकी मारल्या सारखी बोलायला लागल्ये, कळलं ?”

“इ s s श्श ! हल्ली मुळा मुठेच्या पात्रात चुळ भरण्या इतकं सुद्धा पाणी नाहीये, त्यात मी मेली डुबकी कशी काय मारणार ?”

“हे तुला कुणी सांगितलं?”

“अहो परवा लेले काकी गेल्या होत्या पुण्याला, त्या सांगत होत्या !”

“काय ?”

“त्यांची गाडी नदीच्या पुलावरून जातांना, त्यांनी भक्तीभावाने एक पाच रुपयाचं नाणं, चालत्या गाडीतून नदी पात्रात टाकलं !”

“मग ?”

“मग काय मग, खालून एका माणसाचा किंचाळण्याचा आवाज आला ! म्हणून त्यांनी ड्रायवरला गाडी थांबवायला सांगितली आणि त्या खाली नदी पात्रात डोकावून पाहायला लागल्या आणि बघतात तर काय ?”

“काय ?”

“अहो त्यांनी फेकलेलं ते नाणं पात्रात शेती करणाऱ्या शेतकऱ्याच्या कपाळाला लागून, त्यातून रक्त येत होतं !”

“बापरे !”

“त्या मग तशाच धावत गाडीत बसल्या आणि त्यांनी ड्रायवरला गाडी हाणायला सांगितली !”

“हा s णा s य s ला ! काय ही तुझी भाषा ? मी मगाशी जे म्हटलं ते काही अगदीच खोटं नाही ! अगं गिरगांवातल्या गोरेगावकर चाळीला स्मरून, निदान दामटवायला, हाकायला असं तरी म्हणं गं !”

“त्यानं काय फरक पडणार आहे ?”

“जाऊ दे, तुझ्याशी या विषयावर आत्ता वाद घालण्यात अर्थ नाही ! गूड नाईट !”

“अरे वा रे वा, असं कसं गुड नाईट !”

“म्हणजे ? मी नाही समजलो !”

“अहो आत्ता माझा चांगला डोळा लागत होता, तर तुम्हीच नाही का, ‘अगं ऐकतेस का?’ असं बोलून माझी झोप उडवलीत ती !”

“अरे हॊ, आत्ता आठवलं. तू उद्यासाठी जो ‘साखरभात’ करून ठेवला आहेस नां, तो जरा चमचाभर आणून देतेस का ?”

“आत्ता ? रात्री अकरा वाजता ? अहो वाटलं तर सकाळी नाश्त्याला घ्या तो आणि जेवतांना पण घ्या की, आत्ता कशाला उगाच रात्री झोपताना तुम्हाला चमचाभर साखर भात हवाय ?”

“अगं त्याच काय आहे नां, आमच्या मास्तरांनी ‘साखरझोप’ ह्या विषयावर निबंध लिहून आणायला सांगितला आहे !”

“बरं, मग ?”

“मग काही नाही, म्हटलं अनायासे तू आज साखरभात केलाच आहेस, तर तो थोडा खाऊन झोपीन ! म्हणजे रात्री साखरझोप लागून, सकाळी त्यावर काहीतरी लिहिता येईल असा एक सुज्ञ विचार मनांत साखर पेरून गेला इतकंच !”

“अस्स होय ! आता आमच्या ह्या प्रौढ ढ विद्यार्थ्यांची मलाच मेलीला काळजी घेतली पाहिजे ! नाहीतर उगाच मी त्याला आत्ता साखरभात दिला नाही, म्हणून तो जर उद्या परीक्षेत नापास झाला, तर त्याचे खापर माझ्या डोक्यावर फोडून मोकळा व्हायचा !”

असं बोलून बायको किचन मधे गेली आणि बाउल मधे साखरभात घेवून आली. मी पण विजयी मुद्रेने तो बाउल घ्यायला हात पुढे केला आणि धाडकन बेडवरून खाली पडलो!

 

© श्री प्रमोद वामन वर्तक

२८-०१-२०२२

ताजा कलम  – या पुढे भविष्यात प्रौढ शिक्षणाच्या मास्तरांनी, ‘झोप’ या विषयाला धरून निबंध लिहायला सांगितला, तरी त्या विषयी आज जागेपणी, काहीही न लिहिण्याचा मी संकल्प करत आहे !

(सिंगापूर) +6594708959

मो – 9892561086

ई-मेल – [email protected]

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ गोडवा बंधनाचा… ☆ सौ ज्योती विलास जोशी

सौ  ज्योती विलास जोशी

?  विविधा ?

☆ गोडवा बंधनाचा… ☆ सौ ज्योती विलास जोशी 

गोडवा बंधनाचा

दिवस संक्रांतीचा

मधुर वाणीचा

रंग उडत्या पतंगाचा

बंद दाटल्या नात्यांचा

संक्रांतीच्या शुभेच्छांच्या अनेकविध चारोळ्या मध्ये ही चारोळी मला उंच आकाशात घेऊन गेली.अगदी आकाशात विहरणाऱ्या पतंगांजवळ. विविधरंगी उडत्या तबकड्याच त्या !! पतंगांच्या हवेत  डोलणाऱ्या  शेपट्याच्या मोहक हालचालींना मीही मनोमन डोलू लागले.

गदिमांच्या ‘बाई मी पतंग उडवीत होते’ या गाण्याची आठवण झाली ‘हसू फेसाळ घुसळीत अंग’ असे म्हणत लावणी गाणाऱ्या जयश्री गडकर चा चेहरा  डोळ्यासमोर आला.

मनातल्या मनात त्या लावणीचं रसग्रहण चालू होतं

काटा-काटीनं आला ग रंग

हसू फेसाळ घुसळीत अंग

दैव हारजीत घडवीत होते

सूर ताल लय आणि लावणीचा ठसका यांचा फेर धरून मनात नाच चालला होता पण मला अचानक ठसका लागला तो त्या गाण्याचा भावार्थ जाणून….

चढाओढीनं चढवलेले, हवेत स्थिरावलेले,मुक्त विहार करणारे ,इंद्रधनुष्याचा सडा टाकणारे हे पतंग शेपटीचा रुबाब दाखवत जेव्हा नयनसुख देतात तेव्हा गाण्यातील एक ओळ काळजाचा ठोका चुकवते…

माझ्या दोऱ्याने तुटला दोरा

एक पतंग येई माघारा

गेला गुंतत गिरवीत गोते

आकाशात स्थिरावलेला अचानक गोते खात माघारी येणारा, पुन्हा जमिनीच्या कुशीत शिरणारा, क्वचित प्रसंगी झाडाच्या कवेत जाणारा, आयुष्याच्या शेवटी गुंतत गोते खाणारा हा पतंग मला विचारांच्या गर्तेत लोटू लागला.

वरवर स्वच्छंदी वाटणारा हा पतंग स्वातंत्र्य उपभोगतो का? नाही..तोही हवेच्या मूडचा गुलाम… त्याचा आधार म्हणजे मांजा. लोकांना पतंग दिसतो पण ज्यामुळे तो आकाशात फिरवतो तो मांजा दिसत नाही.

पतंगाचे आकाशात उडणे हेदेखील मांजा वर अवलंबून असते मांजाची लांबी पतंगाच्या आकाशाच्या गवसणीला प्रतिकार करते.

पतंग जसा जसा उंच जाऊ पाहतो तशी तशी मांजाची शक्ती( लांबी) अपुरी पडू लागते. जोवर तो एकटा तरंगत असतो तोवर तो विहरतो जणू त्याचे साम्राज्य आहे पण हळूहळू तिथे स्पर्धा सुरू होते. आता तो एकटा नसतो इतर पतंग त्याच्याशी काटा-काटी खेळतात .एक प्रकारचे युद्ध सुरू असते. तो मांजाचे ऐकत नाही. मांजाची शक्ती निष्प्रभ ठरते त्याच्या बेताल वागण्या पुढे! मांजा हात टेकतो. दुर्बल मांजाला दुसऱ्या पतंगाचा मांजा कापतो आणि घडायचे तेच घडते.

क्षणार्धात पतंग माघारी येतो मांजाचे बंधनच त्याला मुक्तीचा आनंद देत होते हे त्या मदमस्त पतंगाला कळू नये का?

आकाशात उडत असलेले पक्षी देखील स्वातंत्र उपभोगत नाहीत. त्यांच्याही पंखाखाली हवेचा दबाव आहे. ती त्याना  दाबते.  ठराविक मर्यादेपलीकडे पक्षीसुद्धा आकाशात जाऊ शकत नाही एका ठराविक उंचीपर्यंत एकांत त्याच्यापुढे एकाकीपण……

बंधन हे बंधन न मानता ते सुरक्षाकवच मानून मुक्तीचा आनंद घेतला तर कसे?

थेंब जेव्हा महासागर होतो त्या क्षणी तो सागराचं बंधन स्वीकारतो.

हीच गोष्ट संक्रांत संक्रमित करत असेल का?……..

 

© सौ ज्योती विलास जोशी

इचलकरंजी

मो 9822553857

[email protected]

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ संस्कार ☆ सुश्री सुनिता गद्रे

सुश्री सुनिता गद्रे

?विविधा ?

 ☆ संस्कार ☆ सुश्री सुनिता गद्रे ☆ 

राधाबाई गोपाळराव गद्रे हे त्यांचे नाव! गोपाळराव म्हणजेच आप्पा! राधाबाई हे त्यांचे नाव कधी वापरात आलेच नसावे. त्यांच्या लग्नानंतर सुरुवातीला त्या धाकट्या वहिनी होत्या. पण दिरांची जसजशी लग्ने होत गेली,तशी त्या धाकट्या वहिनी पण राहिल्या नाहीत आणि कालांतराने त्यांचे आप्पा वहिनी,आप्पा मामी, आप्पा काकू, किंवा सुनंदा नाहीतर दिलीपची आई ,अथवा वृंदाच्या सासुबाई असे नामाभिधान झाले.

तर हे त्या आप्पा वहिनींचे मी रेखाटलेले चित्र…… अतिशय कमी, कामापुरतेच बोलणाऱ्या… हो-नाही मानेनेच म्हणणाऱ्या , आप्पा वहिनी!… “तिचा शब्द म्हणजे अगदी शंभर रुपये तोळा.”असं कधीतरी मी सासुबाईंकडून ऐकलं होतं.

त्यांना खळखळून हसताना…. जोरजोरात गप्पाटप्पा करताना…. कडाडून भांडताना… दंगा करणाऱ्या आपल्या मुलांवर संतापून ओरडताना…. किंवा सुनेबरोबर आवाज चढवून तू तू मैं में करताना… एकूणच वातावरण कधी कर्कश्य तर कधी नादमय करताना…. बहुतेक कुणी पाहिलं किंवा ऐकलं ही नसेल. चेहऱ्यावर कायम एक हलकसं स्मित हास्य… बस तेवढंच! त्यामुळे त्या एक शांत, संयमी व्यक्तिमत्वाचा धनी वाटायच्या.

माझ्या लग्नाला चार-सहा महिनेच झाले होते. मी दिल्लीहून माझी बँकेतली नोकरी सोडायला सांगलीला आले होते. त्यांनी मला एकदा जेवायला बोलावले होते.’ ‘जावेला मदत करून इम्प्रेशन मारूया,’ असा विचार करून मी जरा लवकरच त्यांच्या घरी पोहोचले. स्मितहास्याने  माझे स्वागत झाले. पण बघते तो काय इतर सगळे स्वयंपाकाचे काम संपून स्वयंपाक- काकू पुऱ्या तळत होत्याआणि आम्हा दोघींना करण्यासारखे कोणतेच काम शिल्लक नव्हते. मग कॉफी पिता पिता मी इकडच्या तिकडच्या गप्पा मारायला सुरुवात केली आणि हळूहळू माझ्या लक्षात आलं की मी एकटीच बडबडतेय… आमच्यात संवाद होतच नाहीय. कारण समोरची व्यक्ती फक्त ‘ गुड लिसनर’  आहे. हे बघून मूड खराब झाल्याने मी गप्पच बसले….मला जांभया येऊ लागल्या.तेवढ्यात एक मासिक आणून त्यांनी माझ्या हातात ठेवले.”बस वाचत, जेवायच्या वेळेपर्यंत” असं म्हणून त्या तेथून निघूनही गेल्या. जेवताना त्या सहजच बोलून गेल्या कि त्यांना रहस्यकथा,हेर कथा वाचायला खूप आवडतात. तेव्हापासून त्यांच्या व्यक्तिमत्त्वात खूप गुढ, गहन, गंभीर काहीतरी आहे, असं मला सारखं वाटत आलंय.

त्या अशा अबोलीचं फुल होऊन कशा राहू शकतात?.. हा विचार करताना मला असं वाटायला लागलं की भगवद् गीतेतत स्थितप्रज्ञाची जी लक्षणे आहेत, ती त्यांच्यावर बरोबर फिट् बसतात. ‘न उल्हासे न संतापे ‘.. किंवा ‘सुख-दुःख समे कृत्वा लाभा लाभौ जयाजयौ’.. इत्यादी, इत्यादी…..

खरंच, त्या एका स्थितप्रज्ञाचंच आयुष्य जगल्या. संसाराच्या रहाट-गाडग्यात अनेक बऱ्या वाईट प्रसंगांना सर्वांसारखंच त्यांनाही तोंड द्यावं लागलं. पण नेहमीच्या चिरपरिचित हास्यानंच त्या त्यांना सामोऱ्या गेल्या. कधी त्याबद्दल कोणाकडे तक्रारही केली नाही.

वृद्धावस्था आली. पंच्याहत्तरीपर्यंत व्यवस्थितच होत्या. हळूहळू विस्मरण होऊ लागलं. पण वयाचा विचार करतात ते नॉर्मल होतं. खरी दैव लीला पुढंच आहे. तो वरती बसलेला क्रीडाशिक्षक, नाटककार माणसाला काय काय खेळ  खेळायला, नाटकं करायला भाग पडतो ते सगळं अतर्क्यच असतं.

जन्मभर मौन व्रत धारण करायला लावणाऱ्या त्या मातेला देवानं नंतर अखंड बडबड करण्याचं व्रत करायला भाग पाडलं. या खेळाची वेगळीच इनिंग चालू झाली. स्वतः लहान मुलगी असल्यासारखं बडबडणं, मुलाला बाबा बाबा म्हणून भरवायचा हट्ट करणं, अशी नाटकंही सुरू झाली. त्यामुळं त्या एका वेगळ्याच विश्वात वावरत आहेत असं सगळ्यांना जाणवू लागलं. दिवसेंदिवस याची तीव्रता वाढतच गेली.  जाग्या असेपर्यंत अखंड, अविश्रांत बडबड,… प्रथम वाक्यं होती,…नंतर शब्द थोडे तरी कळणारे!… त्यानंतर असंबद्ध बडबड,…. ओरडणे, दूरपर्यंत ऐकू जाईल असे…. आणि थकून गेल्या की झोपी जाणे!…. जवळजवळ अडीच वर्षं या बडबडव्रताचे पालन चालू होतं.

मला सांगायची संस्कार ही गोष्ट या पुढंच आहे.साधारण दोन वर्षांपूर्वीची गोष्ट..संक्रांतीचा दिवस…. वडीलधाऱ्यांना त्यांच्याकडे जाऊन तिळगुळ देऊन नमस्कार करायची माझी पद्धत. त्या प्रमाणे त्यांच्या खोलीत गेले…. बसलेल्या होत्या.. थोडासा तिळगुळ त्यांना भरवला आणि नमस्कार करायला वाकले,…. क्षणार्धात एक आशिर्वाद देणाऱ्या हाताने माझ्या डोक्याला स्पर्श केला. चमकून मी वर बघितलं .तर एक नेहमीपेक्षा वेगळेच प्रसन्न हास्य चेहऱ्यावर धारण केलेली ती महिला मला मुकेपणाने खूप चांगलं काहीतरी सांगून गेली होती. जिला शब्दातून भावना व्यक्त करता येत नव्हत्या, तिची देहबोली खूप काही सांगून गेली होती.

हे सगळं माझ्या मनाला इतकं स्पर्शून गेलं आणि जो एक अवर्णनीय आनंद मला झाला त्याला तोड नाही. विचार करणारी बुद्धी आणि भावना व्यक्त करणारं मन ज्या मेंदूत( हृदयात नाही.) असतं, त्या मेंदूनं प्रतिक्रया द्यायलाही त्यांना समर्थन केलं होतं. आणि  त्यांना एका वेगळ्या विश्वात नेऊन ठेवलं होतं. त्या मेंदूला हुलकावणी देत आणि वाकुल्या दाखवत त्यांनी मी केलेल्या नमस्काराचं डोक्यात हात ठेवून दिलेले उत्तर, मला वेगळाच संदेश देऊन गेलं.याला विज्ञानाच्या भाषेत प्रतिक्षिप्त क्रिया असे म्हणत असतील ही, पण मला वाटलं की हा एक संस्कार होता. त्यांच्या शरीरावर लहानपणापासून झालेला संस्कार! कितीतरी वेळा असे आशीर्वाद त्यांना मिळाले असतील आणि त्यांनी दिले ही असतील. आणि  सगळं काही विसरून बसलेल्या त्या… पण त्यांच्या शरीरानं त्यांच्या हाता कडून मेंदूला आणि अप्रत्यक्षपणे त्या परमेश्वराला पण हूलकावत आशीर्वाद देण्याचा संस्काराची जणू पूर्तीच केली होती. हे संस्कार कधी शिकून, वाचून, प्रयत्न करून येत नाही तर जीवनानं शरीराला त्याच्या नकळत दिलेली ही एक देणगी असते.

आता आप्पावहिन या जगात नाहीत. पण गेल्या दोन वर्षापासून जेव्हा कधी मला त्यांची आठवण येते तेव्हा तो आशीर्वादाचा हात आणि त्यांची त्यावेळची अतिप्रसन्न मुद्राच माझ्या डोळ्यासमोरून तरळून जाते…. आणि पुढेही जाईल.

* समाप्त *

© सुश्री सुनीता गद्रे

माधवनगर सांगली, मो 960 47 25 805.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ पंडीत बिरजु महाराज ☆ सौ राधिका भांडारकर

सौ राधिका भांडारकर

 

?विविधा ?

☆ पंडीत बिरजु महाराज ☆ सौ राधिका भांडारकर ☆

प्रसिद्ध कथ्थक कलाकार पंडीत बिरजु महाराज यांचे वयाच्या ८३व्या  वर्षी नुकतेच निधन झाले…

जणू भारतीय संगीताची लयच थांबली.

सूर मुके झाले.

भाव शून्य झाले..एक विलोभनीय मुद्रा लोप पावली..

कथक नृत्य हा शब्द उच्चारताच,बिरजु महाराजांचेच नाव ओठावर येते.कथ्थक आणि बिरजु महाराज यांचे असे घट्ट नाते होते.

नृत्याला अभिजात कला न मानता,केवळ अंगविक्षेप म्हणून हेटाळणी केली जायची. त्या काळात,बिरजु महाराजांनी नृत्याला प्रतिष्ठा मिळवून दिली.नृत्यकलेतील अस्सलअभिजातता त्यांनी जपली.

शिवाय नृत्य हे स्त्रियांनी करण्याचा प्रकार आहे.

पुरुषांच्या जातीला हे बरोबर नव्हे,अशा मध्ययुगीन मानसिकतेला बिरजु महाराजांचे नृत्यमय  आयुष्य हे एक पद्धतशीर प्रभावी ऊत्तर आहे.

गायन ,वादन, व नृत्य याचा एकत्रित अविष्कार म्हणजे संगीत.पण गायन आणि वादनाकडे प्रतिष्ठेने पाहिले जाते.त्यामानाने नृत्याला ही प्रतिष्ठा फार उशीरा प्राप्त झाली.

बिरजु महाराज हे लखनौ घराण्यातील प्रमुख प्रतिनिधी होते.कालिकाबिंदादीन या घराण्याची गौरवशाली परंपरा त्यांनी जपली आणि जगभर त्याचा प्रसार केला.

बिरजुमहाराजांचे मूळ नाव, ब्रिजमोहन मिश्रा.

४फेब्रुवारी १९३८रोजी त्यांचा कथ्थक कुटुंबात जन्म झाला.त्यांचे वडील अच्छान महाराज आणि काका शंभुराज हे ही जागतिक स्तरावर प्रसिद्ध कलाकार होते.वडीलांचे अकाली निधन झाल्यामुळे बिरजु महाराजांवर लहान वयात कुटुंबाची जबाबदारी येउन पडली.त्यांनी कथ्थक नृत्याचे धडे आपल्या काकांकडून घ्यायला सुरवात केली.

त्यांचे आयुष्य म्हणजे एक ध्यास होता. शास्रीय नृत्याचा..कथ्थक नृत्याविषयी त्यांनी समाजभान जागृत केले. कोठीतले नृत्य म्हणून ओळख असणार्‍या कलेला त्यांनी लोकांपर्यंत पोहचवले.

त्यांनी अनेक शिष्य घडवले.

या वयातही त्यांचा नृत्याविष्कार तरुणांना लाजवेल इतका लोभस होता..

सरकारने त्यांना पद्मविभूषणाने गौरवले.

पुण्याच्या कला आणि आध्यात्म जगताने त्यांना लक्ष्मी—वासुदेव—कलाभूषण पुरस्कार दिला.

बिरजु महाराज यांनी अनेक बाॅलीवुड चित्रपटात नृत्यदिग्दर्शन केले. उमराव जान,बाजीराव मस्तानी, देढ ईश्कीया या चित्रपटांतील त्यांनी दिलेले नृत्याविष्कार हे अत्यंत प्रेक्षणीय आणि विलोभनीय आहेत…

दिल्लीत कलाश्रम नावाचे नाट्य विद्यालय त्यांनी सुरू केले..या माध्यमातून अनेक शिष्य घडले,घडत आहेत आणि कथ्थक या भारतीय नृत्यकलेची परंपरा जपली जात आहे..

बिरजुमहाराज हे कथ्थक गुरु तर होतेच.

पण ते उत्कृष्ट गायक होते.तबला,सरोद,व्हायोलिन या वाद्यांचे निष्णात वादकही होते.उत्तम दर्जाचे चित्रकार होते.तसेच कोशाकार,लोकसाहित्याचे अभ्यासक,संग्राहक आणि संपादकही होते..

गुरुंकडून मिळालेली विद्या,असामान्य प्रतिभा,आणि अं त:प्रेरणा या त्रयींवर त्यांनी कथ्थक नृत्याचे नवनवे प्रयोग केले.

दरबारातली ही कला त्यांनी रंगमंचावर आणली.

बिरजु महाराज यांचे नृत्य पहाणे म्हणजे स्वर्गीय आनंद असायचा.त्यांच्या मुद्रेवरच्या सहज सुंदर रेषा,अप्रतीम पवित्रे,म्हणजे एक चित्रशिल्पच.

मोराच्या गतीत जेव्हां ते चालत,तेव्हां खरोखरच लखलखीत पिसार्‍याचा डौलदार मोरच आपल्यासमोर नाचतोय असे वाटायचे…इतके सुंदर त्यांचे भावांग…

“मी महाराष्ट्राला माझा पिता आणि बंगालला माता मानतो.कारण बंगालमधे मी माझ्या कलेचा आरंभ केला.पण मला अनेक मानसन्मान व नावलौकिक महाराष्ट्राने दिला..”

हे त्यांचे नम्र उद्गार आहेत…

आज हा महान कलाकार ,नृत्य सम्राट,कथ्थक नृत्य कलेचा सरताज अनंतात विलीन झाला..

जातो तो कलाकाराचा नश्वर देह..

पण त्यातला कलात्मा अमर असतो..!!

त्या देवत्वाचा अंश अंतहीन असतो..

या कलेच्या देवतेला आदरयुक्त श्रद्धांजली…???

 

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ विचार–पुष्प – भाग १ – ध्येय ☆ डाॅ.नयना कासखेडीकर

डाॅ.नयना कासखेडीकर

?  विविधा ?

☆ विचार–पुष्प – भाग १ – ध्येय ☆ डाॅ.नयना कासखेडीकर 

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका विचार–पुष्प.

[भारतीय संस्कृतीतमध्ये आपल्या जीवनात असणार्‍या गुरूंना अर्थात मार्गदर्शन करणार्‍या व्यक्तिंना अत्यंत महत्वाचे स्थान आहे, हे महत्व आपण शतकानुशतके वेगवेगळ्या पौराणिक, वेदकालीन, ऐतिहासिक काळातील अनेक उदाहरणावरून पाहिले आहे. आध्यात्मिक गुरूंची परंपरा आपल्याकडे आजही टिकून आहे. म्हणून आपली संस्कृतीही टिकून आहे.

एकोणीसाव्या शतकात भारताला नवा मार्ग दाखविणारे आणि भारताला आंतरराष्ट्रीय विचारप्रवाहात आणणारे, भारताबरोबरच सार्‍या विश्वाचे सुद्धा गुरू झालेले स्वामी विवेकानंद.

आपल्या वयाच्या जेमतेम चाळीस वर्षांच्या आयुष्यात, विवेकानंद यांनी  गुरू श्री रामकृष्ण परमहंस यांचे शिष्यत्व पत्करून जगाला वैश्विक आणि व्यावहारिक अध्यात्माची शिकवण दिली आणि धर्म जागरणाचे काम केले, त्यांच्या जीवनातील महत्वाच्या घटना आणि प्रसंगातून स्वामी विवेकानंदांची ओळख या चरित्र मालिकेतून करून देण्याचा हा प्रयत्न आहे.]

विचार–पुष्प – भाग १ – ध्येय

जीवनात, आपली प्रत्येकाचीच काहींना काही ध्येये असतात.म्हणजे स्वप्नच म्हणाना. आपल्याला सन्मान मिळावा, आपल्याला उत्तुंग यश मिळावं. आपला प्रत्येक प्रयत्न यशस्वी व्हावा.आणखी बरच काही. मग त्याप्रमाणे आपण प्रयत्नांची शिकस्त ही करत असतो. कोणाचं मार्गदर्शन घेत असतो. सल्ला घेत असतो. एखादी व्यक्ती पण आपल्याला प्रेरणा देणारी असते.त्यांच्याकडून आपल्याला प्रेरणा मिळत असते.आणि आपण पुढे जात असतो. आपल्या जीवनात एखादा आदर्श आपल्यासमोर असेल तर आपले ठरवलेले ध्येय  लवकर साध्य करता येते.

स्वामी विवेकानंदांच्या मते, एखाद्याच्या समोर आदर्श असेल तर तो मनुष्य एखादीच चुक करेल, पण जर समोर आदर्शच नसेल तर तो मनुष्य मात्र, अगणित चुका करेल.म्हणून जीवनात एखादा आदर्श असणे महत्वाचे आहे असे विवेकानंदांना वाटते. ते म्हणतात, “युवकांनी उदात्त ध्येये ठेवली पाहिजेत, ती साध्य  होईपर्यन्त त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली पाहिजे. प्रगतिच्या वाटेवर त्यांचे पाऊल सतत पुढेच पडले पाहिजे.यश प्रयत्नपूर्वक खेचून आणले पाहिजे”. त्यासाठी त्यांच्यात हवी दुर्दम्य इच्छाशक्ती. ती असेल तर तुम्हाला अपेक्षित असलेले यश, मान सन्मान, कीर्ती नक्कीच प्राप्त होईल. अपयशाला सामोरं जाऊन ते यशामध्ये बदलविण्याचे धाडस आपल्यात हवं. मग आपले भाग्य आपल्याच हातात हे अनुभवायचे असेल तर आत्मनिर्भर व्हायला  हवे.  

© डॉ.नयना कासखेडीकर 

 vichar-vishva.blogspot.com

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ कै रामदास कामत – भावांजली ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर

सुश्री अरूणा मुल्हेरकर

?विविधा ?

☆ कै रामदास कामत – भावांजली ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆ 

कै रामदास कामत

(18 फेब्रुअरी 1931 – 8 जानेवारी 2022)

नुकतेच ८जानेवारी २०२२ रोजी आघाडीचे गायक,संगीत शिक्षक आणि नाट्य अभिनेते माननीय रामदास कामत यांच्या निधनाची दुःखद वार्ता आपल्याला मिळाली.एक बुलंद दमदार आवाज अस्तंगत पावला. रामदास कामत म्हटले की आठवते ते त्यांचे देवाघरचे ज्ञात कुणाला हे मत्स्यगंधा नाटकातले पद! अभिषेकी बुवांचे संगीत आणि रामदास कामतांचा स्वर.अगदी मणी कांचन योग…! मत्स्यगंधातील नको विसरू संकेत मीलनाचा हे पदही त्यांनी अजरामर करून ठेवले आहे. ह्याच बरोबर चिरंजीव राहो जगी नाम, नाटक ~ धन्य ते गायनी कळा, तम निशेचा सरला आणि प्रेम वरदानही ययाती आणि देवयानी या नाटकांतील ही गाणी खास त्यांचीच आहेत.

नाट्यसंगीताखेरीज त्यांनी अनेक भक्तीगीते,भावगीते,स्तोत्रे गायिली आहेत.

१८ फेब्रुअरी १९३१ रोजी गोव्यातील साखळी या गावी त्यांचा जन्म झाला. लहानपणापासूनच त्यांना संगीताची आवड.त्यांचे वडील बंधूही गायक होते.तेच त्यांचे सुरवातीचे संगीत गुरू.पुढे यशवंतबुवा जोशी यांच्याकडे त्यांनी शास्त्रीय संगीताचे धडे घेतले.घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे त्यांना संगीताला वाहून घेणे शक्य झाले नाही.

मुंबईत अर्थशास्राची पदवी घेतल्यानंतर नोकरी सांभाळून त्यांनी आकाशवाणीवर गाणे,जमेल तसे नाटकात काम करणे चालू ठेवले होते.

वयाच्या सातव्या वर्षी,१९३८ साली त्यांनी बेबंदशाही नाटकात बाल संभाजीचे काम केले होते,वास्तविक हे गद्य नाटक,परंतु त्यातही त्यांनी दोन पदे सादर केली होती.पुढे तर जवळ जवळ सगळ्याच संगीत नाटकांतून त्यांनी भूमिका केलेल्या आहेत.

एकच प्याला~रामलाल

मानापमान~धैर्यधर

मृच्छकटिक~चारूदत्त

सौभद्र~अर्जून,कृष्ण,नारद.

मात्र मत्स्यगंधापराशर,धन्य तू गायनी कळातानसेन,मदनाची मंजिरीसारंगधर, व ययाती आणि देवयानीकच या त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या.

२००९ मध्ये बीड येथे झालेल्या ८९व्या नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते.तसेच २००८च्या विष्णुदास भावे पुरस्काराचे ते मानकरी ठरले.

एका थोर कलावंताला आज आपण पारखे झालो आहोत.

त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच माझी त्यांना भावंजली!

 

©  सुश्री अरूणा मुल्हेरकर

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ सावरकर आणि सुभाष चंद्र बोस ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

?  विविधा ?

☆ सावरकर आणि सुभाष चंद्र बोस ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

ओम स्थापकायच धर्मस्य हिंदूधर्म स्वरूपिणे/

अवतार वरिष्ठाय  सावरकराय ते नमः //

विनायक दामो दर सावरकर या विनायक  नावाप्रमाणेच ते बुद्धी मान, मेधावान, प्रद्न्यावान असेच होते. जाज्वल्य राष्ट्रभक्ती  नसानसात भिजलेली होती. त्यांच्या आयुष्यात त्यांना काही सहकारीही एकाच मताचे, एकाच विचाराचे असे भेटले होते. अनेक सहकार्यांपैकी, नेताजी सुभाषचंद्र बोस उर्फ सुभाषबाबू यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. दोघेही अभिजात देशभक्त आणि निष्ठावान होते.

सावरकरांचा जन्म सन अठराशे 83 मध्ये आणि सुभाषबाबूंचा जन्म अठराशे 97 मध्ये. इंग्लंडमध्ये जाऊन, सावरकर बॅरिस्टर झाले आणि सुभाषबाबू आय.सी.एस .झाले. पण देशस्वातंत्र्याच व्रत मात्र दोघांचं एकच. 1921 च्या मार्चमध्ये सावरकर अंदमानातून हिंदुस्थानात आले. आणि त्याच जुलैमध्ये सनदी नोकरीवर लाथ मारून सुभाषबाबू मायदेशी परतले. आणि ते सशस्त्र लढ्यावर भर असणाऱ्या, चित्तरंजन दास यांच्या मार्गाने गेले. 1924 ते 1937 सावरकर रत्‍नागिरीत स्थानबद्ध  होते. 1925 – 1926 ला सुभाषबाबू मंडालेच्या कारागृहात होते. तेथून सुटल्यानंतर त्यांनी अनेक देशांना भेटी दिल्या (युरोपातील).  आणि तेथील राजकीय नेत्यांशी विचारविनिमय केला. 1937 मध्ये सावरकर हिंदू महासभेचे अध्यक्ष झाले .आणि 1938 मध्ये सुभाष बाबू काँग्रेसचे अध्यक्ष झाले. दोघेही क्रांतिकारकच! त्यामुळे सशस्त्र क्रांतीवर दोघांचाही विश्वास होता. इतकेच नाही तर, स्वातंत्र्यानंतरच्या राज्यकारभाराचे चित्रही त्यांनी पाहिले होते .दोघांनाही हिंदू संस्कृतीविषयी अत्यंत अभिमान होता .श्रद्धा होती. प्रेम होते. लंडन मधल्या हिंदी सांस्कृतिक कार्यक्रमाला  भारतीय शिरोभूषणच  वापरावं असं सावरकर सांगत. आणि स्वतःही ते तसे वागत. सुभाषबाबू यूरोप मध्ये जिथे जिथे  कार्यक्रमाला जात ,तिथे भारतीय पोषाखातच  जात. तेथील लोकांना हिंदुस्थानचा सांस्कृतिक वारसा मोठ्या अभिमानाने सांगत. सुभाष बाबू बर्लिनमध्ये मराठीही बोलत .आणि छत्रपती शिवाजी आणि सावरकरांचे चरित्र सांगत असत. 1934 मध्ये युरोप मध्ये असतानाच सुभाषबाबूंनी (द इंडियन स्ट्रगल) हिंदुस्तानचा लढा हे पुस्तक लिहिलं. आणि अठराशे सत्तावनचे स्वातंत्र्यसमर हे पुस्तक सावरकरांनी लिहिल.

 दोघांनाही एकमेकांची पुस्तक खूपच आवडली.

१९३७पासून दरवर्षी हिंदुमहासभेचे अध्यक्ष सावरकरच निवडले जात होते  १९३९ मध्ये सुभाष बाबू पुन्हा काँग्रेसचे अध्यक्ष निवडले गेले. पण महिन्याभरातच त्यांनी त्याचं त्यागपत्र दिलं. आणि (फॉरवर्ड ब्लॉक) पुरोगामी  गट  नावाचा नवा पक्ष काढून त्याचे ते अध्यक्ष झाले. १९३९मधे महायुद्ध काळातच उठाव व्हायला हवा, असं सावरकर आणि सुभाष बाबू दोघांनाही प्रकर्षानं वाटत होत. पण महात्मा गांधींचे मत मात्र याविरुद्ध होते. दोघांच्याही मते एका गोष्टीत मात्र मतभिन्नता होती. सावरकरांना वाटत होतं, नव्हे त्यांची खात्री होती की, हिंदू-मुसलमानांच्या  एकी शिवाय आपण स्वातंत्र्य मिळवू शकतो. एकाच वेळी आदिलशाही, कुतुबशाही ,निजामशाही ,बिदर शाही वगैरे पाच शाह्या असूनही छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं होतंच ना! खरंतर दोघांच्याही समोर शिवाजी महाराजांच्या चारित्र्याचा आदर्श होता. दोघांनाही त्यांचा अभिमान होता. पण अजून सुभाष बाबूना सावरकरांचे मत पटत नव्हते. सावरकर युद्धाची संधी साधण्यासाठी सैनिकीकरणाचा प्रचार करत होते .पण सुभाषबाबूंना त्याचा अर्थ नीट न कळल्यामुळे ते त्यांना ‘रिक्रुट वीर’ असं म्हणून हिणवत होते. सावरकरांना मुसलमानांच्या बाबतीतलं काँग्रेसचे धोरण राष्ट्र घातक वाटत होतं. म्हणून “राजकारणाचं हिंदूकरण करा” असं ते सांगत होते. पण तेही सुभाषबाबूंना पटत नव्हतं. सुभाषबाबू बँरिस्टर जीनांना भेटले. पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही.जर्मन हिटलरलाही  भेटले.पण ते सध्या युध्दात भाग घेणार  नसल्याचे हिटलरने सांगितले .

“जपान त्या मानाने जवळ आहे आणि युद्धात भाग घेईल”. असं जपानमध्ये असलेल्या क्रांतिकारक रासबिहारी बोस यांच गुप्त पत्र सावरकरांनी सुभाषबाबूंना दाखवलं. रास बिहारींनी, जपान मध्ये जे क्रांतिकारक होते, त्यांची हिंदू सभा स्थापन केली होती. १९१२ च्या डिसेंबरमध्ये लॉर्ड हार्डिंग्ज वर, मिरवणुकीत बॉम्ब टाकून ,स्त्री वेषात निसटून ते पुढे जपान ला गेले.” तसे सुभाष बाबू तुम्हीही करू शकाल”, असे सावरकर सांगत होते .युद्ध सुरू होताच बंगालच्या उपसागरातून ब्रह्मदेशातून  कोठूनही चढाई करता येईल असं ते सांगत होते.सावरकरांचा आशीर्वाद घेऊन सुभाषबाबू कलकत्त्याला गेले. घराभोवती कडक पहारा होता. शिवरायांचे स्मरण करून, आणि अनुकरण करून, त्या पहाऱ्यातून ते निसटले. ज्याप्रमाणे शिवाजीने संभाजी मेल्याची बातमी पसरवली, त्याचप्रमाणे सुभाषबाबूंनी आपणच मेल्याची बातमी पसरवली. ती तारीख  होती १७ जानेवारी १९४१. त्यांनी पुढे जे स्वातंत्र्ययुद्ध केलं, त्यात ते विमान अपघातात मरण पावले ,अशी बातमी पसरवून ते दुसऱ्या देशात गेले असावेत याबद्दल सावरकरांना खात्री होती.” ही नामी संधी आली आहे, हिंदुस्थाना  बाहेर जाऊन स्वातंत्र्य युद्ध करायला तुम्हीच समर्थ आहात” अस  सावरकर सुभाषबाबूंना म्हणाले होते. म्हणूनच स्वातंत्र्ययुद्धाच श्रेय, सावरकर सुभाषबाबूंना देतात.’अभिनव भारतच्या ‘ सांगता समारंभाच्या अध्यक्षपदी, त्यांनी सुभाषबाबूंची निवड केली होती. पण ते स्वतः येणं शक्य नव्हतं.

म्हणून त्यांचं भव्य चित्रच उच्चस्थानी ठेवलं होतं.

रास बिहारींची गुप्त पत्र, सावरकरांची प्रेरक भेट, आणि सुभाषबाबूंचा साहसी कर्तृत्व या त्रिवेणी संगमाने, भारतात स्वातंत्र्याचा उदय झाला. राष्ट्रभक्ती , राष्ट्रप्रेम, सावरकरांच तेजस्वी प्रेरणा देणारे व्यक्तिमत्व नव्या पिढीच्या समोर यायला हवं, असं मला प्रकर्षानं वाटतं .भारतात सावरकरांना “भारतरत्न” ही सर्वोच्च पदवी दिली तरी ,त्यांच्या योग्यतेला ती अपुरीच पडेल असं वाटतं. त्यांनी जगावं कसं आणि त्याच बरोबर मरावं कसं असेही शिकवलं. “धन्योहं, धन्योहं कर्तव्यं मे न विद्यते किंचित ,”अशा समाधानात प्रायोपवेशण करून आपली जीवनयात्रा संपविली. त्यांचे दिव्यत्व  पाहून  “तेथे कर माझे जुळती,”अस म्हणून आपोआप दोन्ही हात जोडले जातात.

©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

बुधगावकर मळा रस्ता, मिरज.

मो. ९४०३५७०९८७

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित/सौ.मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ नको फक्त मोबाईल..संस्कारही हवेत ☆ सुश्री उषा जनार्दन ढगे

सुश्री उषा जनार्दन ढगे

?विविधा ?

☆ नको फक्त मोबाईल..संस्कारही हवेत ☆ सुश्री उषा जनार्दन ढगे ☆ 

—आजच्या नवयुगातील तुमचा आमचा सर्वांचा घनिष्ठ सोबती म्हणजे स्वतःचा मोबाईल..त्याच्याशिवाय घरबसल्या आप्त-स्वकीयांशी संपर्क साधणें-जोडलेले रहाणें म्हणजे दुर्गम बाब झाली आहे…एकटे असतांना कधी रेंज नसली किंवा नेटवर्क नसले तर एकदम सगळ्यांशी संपर्क तुटल्यासारखा वाटतो व जीव घाबराघुबरा होतो..याचा अनुभव मलाही आलेला आहे…

प्रगत युगातील हे आधुनिक लहानसे यंत्र लाॅकडाऊनच्या काळात तसे खूपच उपयोगी पडले…सर्व व्यवहार ठप्प झालेले असतांना व्यवसाय नोकर्‍या इत्यादींचे वर्क फ्राॅम होम चालले होते…भाजीपाला,जरूरीच्या वस्तू, औषधे इ. सर्व मोबाईलवरून आॅनलाईन मागविल्याने घरपर्यंत पोहोचत होते..स्वकीयांशी संवाद साधता येऊन परिस्थितीचा अंदाज घेता येत होता..

या लाॅकडाऊनच्या काळात शाळा काॅलेजे ही बंद पडल्याने, शाळा-काॅलेज वर्ग आॅनलाईन screen वर असल्याने, मुलांची मोबाईलशी जास्तीत जास्त जवळीक झाली हे मात्र खरे..अजूनही अद्ययावत परिस्थितीमुळे म्हणावा तसा बदल झालेला नाहीय..

या मुलांचे शाळेत जाणें नाही,मित्र-मैत्रिणींशी भेटणें नाही,त्यांच्याशी खेळणे नाही,म्हणून त्यांची चिडचिड होणें स्वाभाविक आहे..परंतु गृहपाठ करण्याचा बहाणा  करून ही लहान मुले आईवडिलांचा मोबाईल घेतात व तासनतास त्यावर गेम खेळत बसतात..किंवा टी व्ही वर कार्टून्स बघत बसतात,वेळेचा अपव्यय करतात हे मात्र गैर आहे..अर्थात काहीजण यांस अपवाद असतील..

मोबाईल,काॅम्प्युटर,लॅपटाॅप,टी.व्ही. याचा वापर किती प्रमाणांत, किती मर्यादा राखून करायचा याची सवय सर्व थोरा-मोठ्यांना अंगवळणी पडलेली बरी…

—आभासी जगतापलिकडेही एक जग असते हे पहाण्याची दृष्टी मुलांना संस्कारातून मिळते..!

अभ्यासाव्यतिरिक्त मिळालेल्या फावल्या वेळेचा सदुपयोग कसा करून घ्यावा याचा सुजाण व जागरुक पालकांनी मुलांना बोध करून द्यावा..हा वेळ त्यांच्या व्यक्तीमत्व विकासासाठी सार्थकी लावण्यात मुलांना सुयोग्य सहकार्य करावे..त्यांचा बहुमूल्य वेळ मोबाईलवर वाया घालविणे इष्ट नाही.. यासाठी पाल्यास दिवसभरातील कामाचे एक वेळापत्रक तयार करून द्यावे..त्यामुळे त्यांना ठरलेल्या वेळात ठरलेली कामें करण्याची नियमित सवय लागून भविष्यात यश संपादन करण्यासाठी निश्चितच चांगला फायदा होईल..यात शारिरीक व्यायाम,योगासने,अथर्वशीर्ष,अभंग-ओव्या पाठ करणें इ.चांगल्या सवयींचाही समावेश होतो..मोबाईलवर गेम खेळण्यापेक्षा,त्यांच्या आवडत्या छंदांना प्राधान्य द्यावे…जसे चित्रे काढणें,रंगविणें,गोष्टींची पुस्तके वाचणे,त्या गोष्टी दुसर्‍या मुलांना कथित करणें,शुध्दलेखन करणें,बुध्दीबळ खेळणें..टाकाऊतून टिकाऊ वस्तू बनविणें,नृत्य संगीताची आवड असल्यास त्यांचा सराव करणें, एखादे वाद्य वाजविण्यास शिकणें वगैरे वगैरे..

बागकाम,शिवणकाम पाककला, हस्तकला लेखन हे मोठ्या मुलांसाठीचे पर्यायही आहेत..

तसेच,मुलांची एकाग्रता वाढविण्यासाठी त्यांना ध्यानधारणा,चिंतन,मनन करण्याची सवय लावावी..अशाप्रकारचे संस्कार करून मुलांना लहान वयातच वेळेचे महत्व समजावून दिले तर त्यांच्याकडून कदापि वेळेचा अपव्यय होणार नाही..

वेळेच्या बाबतीत विल्यम पेन यांचे एक सुंदर वाक्य आहे..ते म्हणतात ” आपल्याकडे वेळेची कमतरता सर्वांत जास्त असते,असे असूनही आपण सर्वांत जास्त दुरुपयोग वेळेचाच करतो..”

वेळ हे जीवनातले असे नाणें आहे जे कसे आणि कुठे खर्च करायचे ते आपणच ठरवू शकतो..!

मुलांवर संस्कार करतांना किंवा संस्कारी मुले घडवीत असतांना,पालकत्व ही केवळ जन्मदात्या पालकांचीच नव्हे तर संपूर्ण कूटुंबाची जबाबदारी असते हेही इथे नमूद करावेसे वाटते..!

कर्तव्य पालकांचे

मुलांसी द्यावे संस्कार

हे संस्कारच देतील

त्यांच्या जीवनास आकार..!

 

© सुश्री उषा जनार्दन ढगे

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares