मराठी साहित्य – विविधा ☆ नको फक्त मोबाईल..संस्कारही हवेत ☆ सुश्री उषा जनार्दन ढगे

सुश्री उषा जनार्दन ढगे

?विविधा ?

☆ नको फक्त मोबाईल..संस्कारही हवेत ☆ सुश्री उषा जनार्दन ढगे ☆ 

—आजच्या नवयुगातील तुमचा आमचा सर्वांचा घनिष्ठ सोबती म्हणजे स्वतःचा मोबाईल..त्याच्याशिवाय घरबसल्या आप्त-स्वकीयांशी संपर्क साधणें-जोडलेले रहाणें म्हणजे दुर्गम बाब झाली आहे…एकटे असतांना कधी रेंज नसली किंवा नेटवर्क नसले तर एकदम सगळ्यांशी संपर्क तुटल्यासारखा वाटतो व जीव घाबराघुबरा होतो..याचा अनुभव मलाही आलेला आहे…

प्रगत युगातील हे आधुनिक लहानसे यंत्र लाॅकडाऊनच्या काळात तसे खूपच उपयोगी पडले…सर्व व्यवहार ठप्प झालेले असतांना व्यवसाय नोकर्‍या इत्यादींचे वर्क फ्राॅम होम चालले होते…भाजीपाला,जरूरीच्या वस्तू, औषधे इ. सर्व मोबाईलवरून आॅनलाईन मागविल्याने घरपर्यंत पोहोचत होते..स्वकीयांशी संवाद साधता येऊन परिस्थितीचा अंदाज घेता येत होता..

या लाॅकडाऊनच्या काळात शाळा काॅलेजे ही बंद पडल्याने, शाळा-काॅलेज वर्ग आॅनलाईन screen वर असल्याने, मुलांची मोबाईलशी जास्तीत जास्त जवळीक झाली हे मात्र खरे..अजूनही अद्ययावत परिस्थितीमुळे म्हणावा तसा बदल झालेला नाहीय..

या मुलांचे शाळेत जाणें नाही,मित्र-मैत्रिणींशी भेटणें नाही,त्यांच्याशी खेळणे नाही,म्हणून त्यांची चिडचिड होणें स्वाभाविक आहे..परंतु गृहपाठ करण्याचा बहाणा  करून ही लहान मुले आईवडिलांचा मोबाईल घेतात व तासनतास त्यावर गेम खेळत बसतात..किंवा टी व्ही वर कार्टून्स बघत बसतात,वेळेचा अपव्यय करतात हे मात्र गैर आहे..अर्थात काहीजण यांस अपवाद असतील..

मोबाईल,काॅम्प्युटर,लॅपटाॅप,टी.व्ही. याचा वापर किती प्रमाणांत, किती मर्यादा राखून करायचा याची सवय सर्व थोरा-मोठ्यांना अंगवळणी पडलेली बरी…

—आभासी जगतापलिकडेही एक जग असते हे पहाण्याची दृष्टी मुलांना संस्कारातून मिळते..!

अभ्यासाव्यतिरिक्त मिळालेल्या फावल्या वेळेचा सदुपयोग कसा करून घ्यावा याचा सुजाण व जागरुक पालकांनी मुलांना बोध करून द्यावा..हा वेळ त्यांच्या व्यक्तीमत्व विकासासाठी सार्थकी लावण्यात मुलांना सुयोग्य सहकार्य करावे..त्यांचा बहुमूल्य वेळ मोबाईलवर वाया घालविणे इष्ट नाही.. यासाठी पाल्यास दिवसभरातील कामाचे एक वेळापत्रक तयार करून द्यावे..त्यामुळे त्यांना ठरलेल्या वेळात ठरलेली कामें करण्याची नियमित सवय लागून भविष्यात यश संपादन करण्यासाठी निश्चितच चांगला फायदा होईल..यात शारिरीक व्यायाम,योगासने,अथर्वशीर्ष,अभंग-ओव्या पाठ करणें इ.चांगल्या सवयींचाही समावेश होतो..मोबाईलवर गेम खेळण्यापेक्षा,त्यांच्या आवडत्या छंदांना प्राधान्य द्यावे…जसे चित्रे काढणें,रंगविणें,गोष्टींची पुस्तके वाचणे,त्या गोष्टी दुसर्‍या मुलांना कथित करणें,शुध्दलेखन करणें,बुध्दीबळ खेळणें..टाकाऊतून टिकाऊ वस्तू बनविणें,नृत्य संगीताची आवड असल्यास त्यांचा सराव करणें, एखादे वाद्य वाजविण्यास शिकणें वगैरे वगैरे..

बागकाम,शिवणकाम पाककला, हस्तकला लेखन हे मोठ्या मुलांसाठीचे पर्यायही आहेत..

तसेच,मुलांची एकाग्रता वाढविण्यासाठी त्यांना ध्यानधारणा,चिंतन,मनन करण्याची सवय लावावी..अशाप्रकारचे संस्कार करून मुलांना लहान वयातच वेळेचे महत्व समजावून दिले तर त्यांच्याकडून कदापि वेळेचा अपव्यय होणार नाही..

वेळेच्या बाबतीत विल्यम पेन यांचे एक सुंदर वाक्य आहे..ते म्हणतात ” आपल्याकडे वेळेची कमतरता सर्वांत जास्त असते,असे असूनही आपण सर्वांत जास्त दुरुपयोग वेळेचाच करतो..”

वेळ हे जीवनातले असे नाणें आहे जे कसे आणि कुठे खर्च करायचे ते आपणच ठरवू शकतो..!

मुलांवर संस्कार करतांना किंवा संस्कारी मुले घडवीत असतांना,पालकत्व ही केवळ जन्मदात्या पालकांचीच नव्हे तर संपूर्ण कूटुंबाची जबाबदारी असते हेही इथे नमूद करावेसे वाटते..!

कर्तव्य पालकांचे

मुलांसी द्यावे संस्कार

हे संस्कारच देतील

त्यांच्या जीवनास आकार..!

 

© सुश्री उषा जनार्दन ढगे

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ चं म त ग ! शॉपिंगचा विजय ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक

श्री प्रमोद वामन वर्तक

? विविधा ?

? चं म त ग ! ⭐ श्री प्रमोद वामन वर्तक ⭐

? शॉपिंगचा विजय ! ?

“अहो, ऐकलंत का, मला जरा पंधरा हजार द्या !”

“पंधरा हजार ? एवढी कसली खरेदी करणार आहेस ?”

“मनःशांती !”

“काय मनःशांती ? आणि ती सुद्धा फक्त पंधरा हजारात ?”

“हो ! पण या पंधरा हजारात ती फक्त एका महिन्यासाठीच मिळणार आहे बरं का !”

“आणि नंतरचे अकरा महिने ?”

“नंतर पुढच्या प्रत्येक महिन्यासाठी मनःशांती हवी असेल, तर परत दर महिन्याला पंधरा हजार भरायचे !”

“अस्स, म्हणजे मनःशांती मिळवायची प्रत्येक महिन्याची फी पंधरा हजार आहे असं सांग की सरळ !”

“अगदी बरोब्बर ओळखलंत तुम्ही !”

“अगं पण तुला ही मनःशांती देणार कोण ?”

“अहो, आपल्या चाळीत ‘नवरे मनःशांती केंद्र’ सुरु झालं आहे गेल्या महिन्या पासून, ते मी जॉईन करीन म्हणते. घरात तुमची सदा कटकट चालू असते, त्यामुळे जरा शांतता नाही माझ्या डोक्याला !”

“क s ळ s लं ! पण आपल्या चाळीच्या ४५ बिऱ्हाडात, माझ्या माहिती प्रमाणे ‘नवरे’ नावाचे कोणतं बिऱ्हाडच नाही, मग…”

“अहो केंद्राचे नांव जरी ‘नवरे मनःशांती केंद्र’ असलं तरी ते चालवतायत तिसऱ्या मजल्यावरचे गोडबोले अण्णा !”

“भले शाब्बास, अण्याने आता हे नको ते धंदे चालू केले की काय या वयात ?”

“काय बोलताय काय तुम्ही ? धंदे काय धंदे ? चांगल पुण्याचं काम करतायत अण्णा, तर तुम्ही त्याला नको ते धंदे काय म्हणताय !”

“अगं पुण्याचं काम करतो आहे नां अणण्या, मग फुकटात कर म्हणावं ! त्यासाठी प्रत्येका कडून महिन्याला पंधरा हजार कशाला हवेत म्हणतो मी ?”

“अहो केंद्र चालवायचं म्हणजे  कमी का खर्च आहे?”

“कसला गं खर्च ?”

“अहो एक सुसज्ज AC हॉल घेतलाय त्यांनी भाड्याने त्यांच्या केंद्रासाठी ! त्याच भाडं, लेक्चर द्यायला बाहेरून मोठं मोठी अध्यात्मिक लोकं येणार त्यांच मानधन, असे अनेक खर्च आहेत म्हटलं.”

“बरं बरं, पण मला एक कळलं नाही, केंद्राचे नांव त्या अणण्याने ‘नवरे मनःशक्ती केंद्र’ असं का ठेवलंय ?”

“ते मला काय माहित नाही बाई, पण एखाद वेळेस आपापल्या नवऱ्यापासून मनःशांती मिळावी, असा उदात्त हेतू असावा असं नांव ठेवण्या मागे अण्णांचा !”

“हे बरं आहे अणण्याच, स्वतःची बायको शांती, त्याला गेली त्याच्या कटकटीमुळे या वयात सोडून माहेरी आणि हा दुसऱ्यांच्या बायकांना मनःशांतीचे धडे देणार ?”

“अहो शेजारच्या कर्वे काकू सांगत होत्या, शांती काकी जेंव्हा अण्णांना सोडून गेल्या, तेव्हाच अण्णा हिमालयात गेले होते एका आश्रमात साधना करण्यासाठी आणि तिथूनच ते दिक्षा घेवून आले…..”

“आणि आता ते तुम्हां सगळ्या भोळ्या साधकांकडून महिन्याला प्रत्येकी पंधरा हजाराची भिक्षा घेवून तीच दिक्षा देणार, असंच नां ?”

“बरोब्बर !”

“अगं पण तुला हवीच कशाला मनःशांती म्हणतो मी ? आपल्या दोन मुली लग्न होऊन गेल्या आपापल्या सासरी, घरात आपण दोघच ! सासूचा त्रास म्हणशील तर, आई जाऊन पण आता दहा वर्ष….”

“उगाच देवानं तोंड दिलंय म्हणून काहीच्या बाही बोलू नका !  मगाशीच मी तुम्हांला सांगितलंय, तुमची रिटायर झाल्या पासून रोज घरात कटकट चालू असते, त्यामुळे माझी मनःशांती ढासळली आहे !”

“अगं पण तुझ्या ढासळलेल्या मनःशांतीवर माझ्याकडे एक जालीम उपाय आहे ! त्यासाठी महिन्याला पंधरा हजार खर्च करायची काहीच गरज नाहीये !”

“अहो, उगाच महिन्याचे पंधरा हजार वाचवण्यासाठी मला काहीतरी फालतू उपाय सांगू नका तुमचा ! गपचूप…..”

“अगं आधी उपाय ऐकून तर घे मग बोल !”

“ठीक आहे, बोला !”

“हां, तर उपाय असा आहे, मी तुला या महिन्यापासून दर महिन्याला, फक्त तुझ्या शॉपिंगसाठी बरं का, पाच हजार देणार आणि त्याचा हिशोब पण मागणार नाही, बोल !”

“काय सांगताय काय ? फक्त माझ्या एकटीच्या शॉपिंगसाठी महिन्याला पाच हजार ?”

“हॊ s s य!”

“पण अहो, त्या माझ्या पाच हजारच्या शॉपिंगमधे मी तुमची एक लुंगी सुद्धा आणणार नाही, कळलं नां ?”

“अगं लुंगीच काय, माझा एक साधा हातरूमाल सुद्धा मी तुला आणायला सांगणार नाही, मग तर झालं !”

“मग ठीक आहे !”

“पण त्यासाठी माझी एक अट आहे”

“आता कसली अट?”

“हे महिन्याचे तुझ्या एकटीच्या शॉपिंगसाठीचे पाच हजार तुला पाहिजे असतील, तर ‘नवरे मनःशांती केंद्राचा’ नाद तुला सोडावा लागेल !”

“पण मग माझ्या ढासळलेल्या मनःशांतीवरच्या उपायाच काय ?”

“ते काम माझ्याकडे लागलं !”

“तुम्ही करणार उपाय?”

“हो s s य !”

“अहो मला जरा कळेल का, तुम्ही कसला उपाय करणार आहात ते !”

“अगं साधा पंधरा रुपयाचा उपाय आहे, तू माझ्यावर सोड !”

“आता बऱ्या बोलानं सांगताय, का जाऊ नांव नोंदवायला अण्णांकडे ?”

“अगं काही नाही, खाली जातो आणि पंधरा रुपयात मिळणारे, स्विमिंग करतांना पोहणारे लोकं, जे इअर प्लग्स घालतात ते घेवून येतो !”

“त्यांच मी काय करू ?”

“अगं तुला असं जेव्हा जेव्हा वाटेल, की मी आता तुझ्याशी कटकट करायला सुरवात केली आहे, तेव्हा तेव्हा ते तू कानात घालायचेस ! म्हणजे तुला माझ्या बोलण्याचा त्रास होणार नाही आणि तुझी……”

“मनःशांतीपण ढासळणार नाही, काय बरोबर नां ?”

“अगदी बरोब्बर ! मग आता काय, जाणार का त्या ‘नवरे मनःशांती केंद्रात नांव नोंदवायला ?”

“नांव नका काढू त्या केंद्राचे, पण माझं

आत्ताच्या आत्ता एक काम करा जरा !”

“ते आणि काय ?”

“तसं काही खास नाही, मी आल्याचा चहा घेवून येते, तो पर्यंत या महिन्याचे माझे शॉपिंगचे पाच हजार काढून ठेवा ! लगेच या महिन्याच्या शॉपिंगला जाते ! शुभस्य शीघ्रम !”

असं बोलून बायको किचन मधे पळाली आणि मी दर महिन्याचे दहा हजार कसे वाचवले याचा विचार करत, स्वतःची पाठ स्वतःच थोपटू लागलो ! शॉपिंगचा विजय असो !

 

© श्री प्रमोद वामन वर्तक

२१-०१-२०२२

(सिंगापूर) +6594708959

मो – 9892561086

ई-मेल – pradnyavartak3@gmail.com

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ काळी चंद्रकळा नेसू कशी? ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

?विविधा ?

☆ काळी चंद्रकळा नेसू कशी? ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

महाराष्ट्रीयन स्त्रियांच्या वेषभूषेत नऊवारी, पाचवारी साडीची खासियत असते. पंजाबी ड्रेसचे प्रमाण वाढले असले तरी लग्नात मिरवायला शालू, पैठणीच आवडते. आपल्या महाराष्ट्रीयन पद्धती नुसार लग्नानंतर येणाऱ्या पहिल्या संक्रांतीला काळी साडी घेण्याची पद्धत होती. काळ्या साडीवर पांढरी खडी असलेली चंद्रकळा उठून दिसत असे. त्यावर हलव्याचे दागिने घातले की चंद्र कळा अधिकच खुलून दिसे. लग्नानंतर पहिल्या वर्षी हौसेने हळदीकुंकू करून नवीन सुनेला काळी साडी नेसायला लावणे आणि हलव्याचे दागिने घालून तिचा सण करणे हे सासू ला आवडत असे तसेच सुनेलाही त्यात कौतुक वाटत असे. आमच्या लग्नानंतर माझ्या मोठ्या नणंदेने हलव्याचे सर्व दागिने करून आणले होते. बिंदीपासून ते पायातल्या जोडव्या पर्यंत! अगदी कंबर पट्टा सुद्धा केला होता हे सर्व दागिने काळ्या चंद्र कळेवर खूपच खुलत होते.इतकी वर्ष झाली तरी तेव्हाचा तो   चंद्रकळेचा स्पर्श मनाला आठवतो आणि अजूनही मी अधून मधून संक्रांतीला काळी साडी खरेदी करते.

जानेवारी महिन्यात येणारा संक्रांत सण हा विविध गोष्टीने सजलेला असतो शेतकऱ्यांसाठी शेतात पिकणारी दौलत- बाजरी वांगी, तीळ,सर्व प्रकारची धान्ये आणि भाज्या -अशा स्वरूपात दिसत असते. भारतात सगळीकडे हा सण विविध रुपात साजरा केला जातो. दक्षिणेत त्याला ‘पोंगल’ म्हणतात.तर उत्तरेकडे हा संक्रांतीचा सण ‘पतंगाचा सण’ म्हणून प्रसिद्ध आहे. या दिवसात हवा स्वच्छ असते. आकाश निरभ्र असते. आकाशाच्या पार्श्वभूमीवर उंच  उंच जाणारे पतंग मनोहारी दिसतात.!

या सणाला दानाचे महत्त्व आहे.त्यामुळे आपल्या जवळ असलेले दुसऱ्याला देणे ह्याचे संक्रांतीला महत्व आहे.हळदीकुंकू करून त्या निमित्ताने सवाष्णी ला दान करणे हा मूळ हेतू होता,तो कमी होऊन आता कोणी काय वस्तू लुटल्या हे सांगणे आणि आपले वैभव दाखवणे यासाठीच हळदीकुंकू समारंभ करतात की काय असे वाटते! पूर्वी सुगड दान

करत असत.त्या सुगडात उसाचे करवे, तीळगुळ,वाटाणा हरभरा,पावटा,यासारखे त्या दिवसांत मिळणाऱ्या गोष्टी घालत असत.आता सुगडाची पध्दत शहरात फारशी दिसत नाही,पण गावाकडे मात्र अजूनही सुगडांचे पूजन केले जाते.

आपल्या हिंदू संस्कृतीत आपले सणवार हे कालानुरूप साजरे केले जातात.या थंडीच्या दिवसांत स्निग्ध पदार्थ जास्त खावेत या हेतूने तीळगुळ, तूप, लोणी,बाजरी यांसारख्या गोष्टींचा उपयोग आहारात केला जातो.संक्रांतीनंतर सूर्याचे संक्रमण होऊन दिवस मोठा होऊ लागतो.उष्णता वाढू लागते.उन्हाळ्यात काळे कपडे आपण घालू शकत नाही. पण संक्रांतीला आपण आवर्जून काळे कपडे वापरतो.लहान बाळांना बोरन्हाण घालणे,काळी झबली,फ्राॅक घालणे हे सर्व कौतुकाने करतो,कारण पुढील चार महिने काळा कपडा अंगावर नको वाटेल! प्रत्येक सण असा काही हेतू ने साजरा केला जातो.

आज काळी साडी कपाटातून बाहेर काढल्यावर आपोआपच असे काही विचार, आठवणी मनात जाग्या झाल्या, त्या शब्द रूपात प्रकट केल्या.. इतकेच!‌

 

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ बापाची सायकल…..! ☆ प्रा.अरूण विठ्ठल कांबळे बनपुरीकर

प्रा.अरूण विठ्ठल कांबळे बनपुरीकर

? विविधा ? 

☆ बापाची सायकल…..! ☆ प्रा.अरूण विठ्ठल कांबळे बनपुरीकर ☆

बापाच्या बँक खात्यात दोन पैसं आलं की नेहमीप्रमाणं आमच्या आप्पांची आईच्या मागं भूणभूण असायची. मला हे घेऊन दयायला सांग म्हणून. त्यातच वरच्या आळीतली सरमाडी पोटात गेली की मग साऱ्या गावात हाय लय भारी म्हणत ओरडत रहायची त्यांची सवय साऱ्या घरादाराला आणि गावाला पण काही नवीन नाही.

आमच्या लहानपणापासून आम्ही आप्पांना असंच पहात आलोय. सारं आयुष्य झिंगतच काढलेल्या बापाची ही सवय काही अजून तर सुटलेली नाही. चार दिवस आईबरोबर भूणभूणत राहणाऱ्या आप्पाचं -मला सायकल तर नवीन घेऊन दयायला सांग नाहीतर इलेक्ट्रिक गाडी तर घ्यायला सांग – त्याला शिकवलंय कुणी -मी- अशी रोजचीच बडबड आई फोनवरून सांगत रहायची. “बरं घेऊया ” म्हणत मी ऐकत रहायचो-आणि क्षणभर मन भूतकाळात जाऊन यायचं…..!

गावातनं १५ किलोमीटरवर असणाऱ्या आटपाडीच्या साखर कारखान्यात करकरणाऱ्या सायकलीने पाय खोडत केलेल्या बापाच्या पाळ्या नजरेसमोरून हटता हटत नाहीत. पाच सहा महिन्यातनं एकदा झालेला पगार तिकडच गडप करून आलेल्या बापाचं रिकामंपण अजूनहीं विसरता म्हणता विसरता येत नाही. कारखाना बंद पडला.. बापाचं कामपण बंद झालं. पण बापाच्या अंगाचा कारखान्याच्या मळीचा वास आणि लिकरची साथ काय सुटली नाही. कारखान्यात असताना आटपाडीच्या स्टँडवर सायकल एकीकडे आणि बाप एकीकडे पडलेला दिसायचा. खरंतर दारुड्या विठूची पोरं म्हणूनच आजही गावात आमची ओळख. (मी सेट/नेट झाल्यावर व दिल्ली येथे भारतीय दलित साहित्य अकादमीचा माझ्या  ‘काळजातला बाप’ या पुस्तकाला फेलोशिप मिळाल्यावर पोरांनी गावातल्या चौकात मोठे पोस्टर लावले होते. त्या पोस्टर पुढं बाप कितीतरी वेळा पिऊन पडलेला असायचा. गावी गेलो की अजूनही पोरं सांगत राहतात.)….बाप चांगला असला की त्यांच्यासारखा कुणी नाही पण बिघडला की बापासारखा कुणी नाही ; असं आजही कुणी कुणी बोलत असतं. पोरांनी शिकावं म्हणून उपदेशाचे डोस देत रहाणारा बाप नेहमीच आठवत राहतो. त्यांच्या भीतीनं कोपऱ्यात अभ्यास करत बसलेल्या आम्हा तिघा भावंडाना पाहून बापाचं काळीज सुपाएवढं व्हायचं. “मला हे दत्तगुरु दिसले ” हे गाणं म्हणत बाप तिथंच बडबडत रहायचा. पगार झाल्या झाल्या बाप आटपाडी स्टँडवरच्या पेपर स्टॉलवरून चंपक आणि चांदोबा पुस्तकं हमखास आमच्यासाठी आणायचा. पोरांना जगाची ओळख व्हावी म्हणून बाप त्याही काळी रोज आटपाडीतून कामावरून येताना वर्तमान पेपर नेमानं आणायचा. “शिक्षण हा तिसरा डोळा राहू नको तू भोळा”अशी गाणी म्हणत रहायचा. आई मात्र काबाडकष्ट करून बापाचा संसार जगवत रहायची.स्वतः अडाणी असून पोरांच्या शिक्षणासाठी शेतामातीत झिजत राहायची.

आजही बापाचं जगणं आणि आईचं झिजणं जसंच्या तसंच आहे…..!

गेल्या महिन्यात विदयापिठाच्या पीएचडीच्या इंटरव्ह्यूनंतर सिलेक्शन झाल्यावर पहिल्यांदा बापाला फोन लावला आणि सांगितले – “आप्पा, पीएचडी म्हणजे काय माहीत आहे का.”…”होय माहित आहे की ”  ……. “तुमच्या पोराला पीएचडीला अँडमिशन मिळाले आहे. तुमच्या दोस्तांना सांगा दारुड्या बापाचं पोरगं पीएचडी करतय म्हणून “…..बाप फोनवर क्षणभर स्तब्ध झाला. मनापासून हसला. कारखान्यातल्या गोड साखरंसारखा बापाचा भास मला विद्यापीठाच्या त्या आवारात जाणवत राहीला. आईला विचारलं “आई तू शाळेत गेली होतीस का “……”हं कशाची शाळा बाबा”…….” मग तू पण सांग तुझ्या मैत्रिणींना,अडाणी आईचं तुझं पोरगं पीएचडी करतंय म्हणून.. “……नकळत तिच्या झिजलेल्या शरीरावरही मुठभर मांस चढल्याचं क्षणभर जाणवलं. (खरंतर पूणे, कोल्हापूर, सोलापूर आणि जळगाव या चार विद्यापीठाची मी एकाच वेळी पीएचडी साठीची पेट परीक्षा दिली होती.या चारही विद्यापिठाच्या पीएचडीसाठी मी क्वालिफाईड झालो होतो.हा अनुभव माझ्यासाठी खरंतर माझं सगळं घरच पीएचडी झाल्यासारखा होता.)

……………….. नेमका हाच धागा बापानं पकडून ठेवला होता. आणि आईच्यामागं सायकल किंवा मोटर सायकल पाहिजेच आणि तीही ‘झेंडा उंचा ‘च्या दिवसापर्यंतच- म्हणून भूणभूण लावली होती….वर “मीच शिकवलंय पोराला “..म्हणून जरब मात्र ठेवला होता……!

सायकल की मोटार सायकलवरून शेवटी सायकलवरचा त्यांचा शिक्का फायनल झाला. (गावी आजही बापाच्या नावानं घेतलेली ओमनी गाडी व सीडी हंड्रेड या गाडया आहेत. शिका म्हंटलं तरी बापानं कधी चालवल्या नाहीत. गाडीच्या पाठीमागे मोठ्या अक्षरात ‘आप्पा’लिहलेली अक्षरे पाहूनच बाप समाधानी. त्यामुळं कदाचित बाप सायकलीवर ठाम झाला असावा.)…….आणि मग ठरलं. ‘तुम्हाला कसली सायकल पाहीजे ती घेऊया की..या सांगलीला’-  म्हणून सांगलीत बोलवून घेतले.सायकलच्या दुकानातील वेगवेगळ्या देखण्याझार दिसणाऱ्या सायकलीवरुन बापाची नजर फिरत फिरत एकदाची एक सायकल फायनल झाली.२४ इंचीच सायकल पाहिजेचा हट्टही पुरा झाला. हरक्युलसवरून टाटाची दणकट सायकल बापाला आवडली.जे हवे ते सर्व पार्टस् बसवून सायकल स्वारी तयार झाली…… “लगेच गावी घेऊन जाणार,मी काही थांबणार नाही ” म्हणत बाप एसटी स्टँडकडे निघाला सुद्धा.सांगलीचे एसटी कंट्रोलर असणारे माझे मित्र मोरे साहेबांना सायकलीबद्दल अगोदरच सांगितले होते.त्यांच्या सहकार्याने नवी कोरी सायकल एसटीच्या टपावर व्यवस्थित बांधली.आप्पांना एसटीत बसविले आणि सायकल करगणीत उतरून घ्यायला सांगितले.गावी भावाला फोन करून करगणीत एसटीची वाट पहायला सांगितले…..एसटी हलेपर्यंत हरखून गेलेल्या बापाबरोबर काही क्षण घालवले.ज्या एसटीने बाप मला जेवणाची गाठोडी पाठवायचा आणि ती गाठोडी आटपाडी-जोतिबा गाडीतून ज्या ठिकाणी घ्यायचो ती सांगली स्टॅडवरची जागा डोळेभरून मी पहात होतो.

आज त्याच डेपोतील एसटीने माझ्या बापाची सायकल रुबाबात जिथे बाप पोराच्या शिक्षणासाठी एसटीत डबे ठेवायचा त्या ठिकाणी निघाली होती….!

…..घरी मात्र अजूनही करकरणारी बापाची जूनी सायकल…आता तिला काय वाटत असेल याच विचारात मी हरवून गेलो होतो…..आणि बापाची नवी कोरी सायकल त्या एसटीच्या टपावरून खुद्कन् हसत मला टाटा-बाय-बाय करत होती……!!

 

© प्रा.अरुण कांबळे बनपुरीकर..

‘काळजातला बाप ‘कार..

मु.पो.बनपुरी ता.आटपाडी जि.सांगली

९४२११२५३५७…

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आयुष्य एक प्रवास ☆ सुश्री संगीता कुलकर्णी

सुश्री संगीता कुलकर्णी

? विविधा ? 

☆ आयुष्य एक प्रवास ☆सुश्री संगीता कुलकर्णी ☆

आयुष्य.. ! तसं पाहिलं तर आयुष्य हा एक प्रवासच असतो. प्रत्येक व्यक्तीला तो करावाच लागतो. अगदी लहानपणापासूनचा हा प्रवास अगदी स्वतःच्या नकळत येणाऱ्या प्रत्येक दिवसा बरोबर करावा लागतो.. तसे पाहायला गेलं तर आयुष्याच्या प्रवासाचं वर्णन करणं सोपं नाही. प्रत्येकाचेच आयुष्य वेगळे असते आयुष्याचा प्रवासही वेगवेगळाच म्हणायचा.. माझं ही तसंच समजा… छोटा का होईना?..

ह्या प्रवासात वेगवेगळी वळणे येत असतात पण ह्या प्रवासाची खरी गमंत म्हणजे प्रत्येकाचाच प्रवास हा अगदी भिन्न असतो. काहींसाठी हा प्रवास खडतर तर काहींसाठी खूप मजेशीर असतो. काहींना ह्या  प्रवासाचा हेवा वाटतो तर काहींना तो नकोसा वाटतो. पण खरी मजा तेव्हा येते जेव्हा ह्या प्रवासात नवीन वाटा  येतात.. अनोळखी वाटा एकत्र होतात नवीन व्यक्ती येतात आणि एकाच वाटेने प्रवास करत आपल्याला सोबत  करतात.. तसं म्हटलं तर आयुष्याचा प्रवास हा एकट्याचाच.. तरीही विधात्याने त्यात रंजकता आणावी म्हणून पेरलेली असते ती सोबत प्रत्येक वळणावर प्रवासाला वेगळा अर्थ अन् दिशा देण्यासाठी..

आयुष्य हळू हळू चालत राहणार, एका वेगळ्या वळणावर असणार, कधी अमावसेच्या रात्री सारखं अंधारमय असणार तर कधी पौर्णिमेच्या चंद्रासारखं कलेकलेनी  वाढणार.. कधी श्रावणसरी सारखं रिमझिम सुखद बरसणार..तर कधी   चैत्रातल्या कडक उन्हासारखं पोळणारं…आयुष्य कुणासाठीच न थांबणार सतत पुढे जात राहणारं.. आयुष्य प्रत्येक पावलावर नवं काही शिकविणार, अनुभवाचे धडे देणार आणि आठवणीची शिदोरी देणार आयुष्य.. हेच आयुष्य पावला पावलावर जगणं शिकवणार… मात्रं हा प्रवास करताना माणसाला खूप काही शिकायला मिळतं.. नव-नवीन गोष्टींची अनुभूती होते आणि असचं आयुष्याचा एक एक टप्पा गाठत माणूस आयुष्यात पुढे पुढे जात असतो…कुठेतरी आपण सगळेचजण आपल्या पाठीवरती वा मनावरती आयुष्याच ओझं घेऊन प्रवास करत असतो तरी पण कुठल्यातरी वळणावर असं वाटून जातं की हा आयुष्याचा प्रवास आपण एकटे सहजपणे पूर्ण करू शकतो ? पण बारीक विचार केला तर खरंच असं होऊ शकतं का..? एकट्यानं हा आयुष्याचा प्रवास पूर्ण होऊ शकतो का ? आणि झालाच तर तो प्रवास आपल्या मनाला आनंद देणारा ठरू शकतो का..? असे कितीतरी प्रश्न.. उत्तर मात्र अनुत्तरीत… मग मात्र कुठेतरी असही वाटू लागतं की आयुष्याच्या या प्रवासात प्रत्येकालाच एका जोडीदाराची गरज असते नाही का ? परमेश्वरानं बनवलेल्या या सुंदर  कलाकृतीने दोघेही एकमेकांशिवाय अपूर्णच.. असो मनावरच्या ओझ्यांबद्दल बोलायचंच झालं तर काहींना भूतकाळात केलेल्या चुकांचं ओझं, काहींना जबाबदारीच ओझं, काहींना तुटलेल्या स्वप्नाचं ओझं तर काहींना भाविष्यकाळातली स्वप्न पूर्ण करण्याचं ओझं… काहींना इतरांच्या अपेक्षांचं ओझं तर काहींना स्वतःच निर्माण केलेल्या अपेक्षांचं ओझं .

पण या ओझ्यांची गंमत अशी असते की आपण जर एकटेच हे ओझे वाहत निघालो तर या ओझ्याचं वजन जड वाटायला लागतं पण जर कोणी सोबती या प्रवासात बरोबर मिळाला तर हेच ओझं हळू हळू जाणवेनासं होतं आणि बघता बघता हाच खडतर वाटणारा आयुष्याचा प्रवास एकदम सोपा होऊन जातो.. सोपा वाटायलाही लागतो… आयुष्याच्या या प्रवासात प्रत्येकालाच असा साथीदार मिळेल असं मात्र नाही. काही नशीबवान लोकांना सहज मिळून जातो तर काहींना मात्र बऱाच काळ वाट पाहावी लागते.. या आयुष्याच्या प्रवासात शेवटपर्यंत साथ देणारा साथीदार ज्याला मिळतो ना त्याला नशीबवान म्हणावे लागेल आणि अजूनही ज्याच्या आयुष्यात असा साथीदार कोणी आला नसेल तर विश्वास ठेवा की कुठल्यातरी वळणावरती नकळतपणे कोठून तरी  आयुष्याच्या रस्त्याला तो नक्कीच येऊन मिळेल तोपर्यंत एकट्यानं का होईना हा आयुष्याचा प्रवास चालू मात्र ठेवावा हं…. म्हणतात ना आयुष्य हे एक रेसचे मैदान आहे इथे घोडे ही आपलेच आणि सवारीही आपलीच… जिंकलो तरी आनंद आणि हरलो तरीही आनंदच…

काहीजण हा आयुष्य -प्रवास करायचा म्हणून करतात तर काहीजण ह्या प्रवासाचा मनापासून आनंद घेत असतात.. टप्प्याटप्प्याने काळा सोबत पुढे सरसावणारा हा प्रवास कधी वेग पकडतो कळतच नाही.. पापण्यांची उघडझाप झाली आणि त्या एका क्षणात पूर्ण आयुष्य सरले असे वाटायला लागते मग असे वाटते की आपण ह्या संपूर्ण प्रवासात  जगायचेच विसरलो… आयुष्य जगलोच नाही.. आपल्या खूप इच्छा, आकांक्षा अपूर्ण राहिलेल्या असतात. खूप प्रश्नांची उत्तरं मिळायची बाकी राहिलेली असतात, खूप साऱ्या गोष्टी गुपित बनून राहतात.. मग या थोड्या वेळात खूप जगावं वाटायला लागतं अगदी काळाचं चक्र उलट फिरवून मागे परतावेसे वाटते आणि पुन्हा एकदा भरभरून जगावेसे वाटू लागते अर्थातच प्रवासाच्या या अंतिम टप्प्यावर आल्यावर मात्र ते अशक्य असत… पण एक गोष्ट शक्य आहे ती म्हणजे आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यावर असताना येणारा प्रत्येक क्षण आनंदाने जगण्याचे ठरवले कि आयुष्य हे नक्कीच सुंदर वाटतं आयुष्याकडून कुठल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता त्यातील प्रत्येक सुंदर गोष्टींचा आस्वाद घेत जगलं कि आयुष्य हे खूप सुंदर बनतं…

प्रवासातली ती वळणे, आणि वळणांवरचा तो प्रवास.. सहसा आठवणीतून मिटला जात नाही..

कारण तिथल्या काही पाऊलखुणा, प्रवास संपला तरी सहसा पुसल्या जात नाहीत..

 

© सुश्री संगीता कुलकर्णी 

लेखिका /कवयित्री

ठाणे

9870451020

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ पिनकोड ☆ संग्रहिका – सुश्री मृदुला अभंग

?  विविधा ?

☆ पिनकोड ☆ संग्रहिका – सुश्री मृदुला अभंग ☆

भारतातील पिनकोड सिस्टिम चा जनक कोकणातील ‘राजापूर’ मधील शाळेत शिकलेला एक हुशार माणूस असेल याची आपल्याला पुसटशी कल्पना ही नसेल… त्यांचे नाव श्रीराम भिकाजी वेलणकर…

PIN म्हणजे Postal Index Number… १९७२ पर्यंत जनरल पोस्ट ऑफिसांत पत्रांवरचे पत्ते वाचून त्यांची विभागवार विभागणी व्हायची… पण त्यात बऱ्याच अडचणी यायच्या… म्हणजे एकसारख्या नावाची माणसं, एकसारख्या नावाची गावं, कधी कुणाचं अक्षर नीट वाचता येण्यासारखं नसे… आणि हे सगळं कमी की काय म्हणून आपल्या देशभरात पत्ता लिहिण्यासाठी वापरलेल्या कितीतरी भाषा.! चुकीचे पत्ते लिहिणं हा तर काही लोकांचा जन्मसिद्ध अधिकार आहेच.!

या सगळ्या अडचणीतून जात असताना त्यावर उपाय म्हणून  पोस्ट आणि टेलीग्राफ खात्यात नोकरीत असलेले श्रीराम भिकाजी वेलणकर यांनी १५ ऑगस्ट १९७२ रोजी पिन कोड पद्धत अंमलात आणली… पिनकोडमुळे बरीच कामं सोपी झाली…

पिनकोडची रचना अशी आहे… पूर्ण देश ९ झोन मध्ये विभागला गेला आहे… यातले ८ झोन हे भौगोलिक विभाग आहेत… तर एक खास मिलिट्रीसाठी वापरला जातो… या मधील पहिले दोन अंक पोस्ट ऑफिस दर्शवतात… म्हणजे यातही हा तक्ता वापरता येईल…

११, दिल्ली…*

१२ व १३, हरयाणा…*

१४  ते १६, पंजाब…*

१७, हिमाचल प्रदेश…*

१८ ते १९ जम्मू/काश्मिर…*

२० ते २८, उत्तर प्रदेश/उत्तराखंड…*

३० ते ३४ – राजस्थान…*

३६ ते ३९, गुजरात…*

४० ते ४४, महाराष्ट्र…*

४५ ते ४९ मध्य प्रदेश/छत्तीसगड…*

५० ते ५३, आंध्र प्रदेश…*

५६  ते ५९, कर्नाटक…*

६० ते ६४, तामिळनाडू…*

६७ ते ६९, केरळ…*

७० ते ७४, पश्चिम बंगाल…*

५५ ते ७७, ओरिसा…*

७८, आसाम…*

७९, पूर्वांचल…*

८० ते ८५ बिहार आणि झारखंड…*

९० ते ९९, आर्मी पोस्टल सर्व्हिस…*

म्हणजे सहा आकडी पिनकोडमधला पहिला अंक विभाग दाखवतो, दुसरा अंक उपविभाग, तिसरा अंक  सॉर्टींग जिल्हा आणि राहिलेले शेवटचे तीन अंक हा त्या विशिष्ट पोस्ट ऑफिसचा नंबर असतो…

उदाहरणार्थ ४१३००१ हा सोलापूरचा पिनकोड आहे… यात पहिला अंक दाखवतो पश्चिम विभाग, त्यानंतर १३ हा पश्चिम विभागातल्या महाराष्ट्रातला एक उपविभाग दाखवतो, ४१३ हा अंक सॉर्टिंग जिल्हा दर्शवतो, तर शेवटचे तीन अंक ००१ हा सोलापूर जिल्ह्यातल्या विशिष्ट पोस्ट ऑफिसचा नंबर आहे…

*आता पत्रं लिहिणं दुर्मिळ होत चाललं असलं तरी पिनकोड सिस्टिम कधीच इतिहासजमा होणार नाही… ही अशी पद्धत शोधणाऱ्या श्रीराम भिकाजी वेलणकर यांना मानाचा मुजरा.

श्रीराम वेलणकर हे संस्कृत पंडित होते व पाली भाषेचे गाढे अभ्यासकही होते…

 

— संग्रहिका – सुश्री मृदुला अभंग

 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मकर संक्रांत….भाग-२ ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

?  विविधा ?

☆ मकर संक्रांत….भाग-२ ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

यानंतरचा मुख्य दिवस मकरसंक्रांत. या दिवसाची एक पौराणिक कथाही सांगितली जाते. संक्रांत या देवतेने संकरासुर दैत्याचा वध केला. तो हा आनंदाचा आनंदोत्सवाचा दिवस. संक्रांती म्हणजे सम्यक क्रांती. क्रांती मध्ये   हिंसेला महत्व असेल, पण सं–क्रांती मध्ये मानवी मनाचे संकल्प बदलण्याचा विचार असतो. संक्रांती म्हणजे संग क्रांती. प्रत्येकाने मुक्त व आनंदी जीवन जगणाऱ्या, लोकांशी संग युक्त होऊन,  षड्रीरिपूं पासून दूर राहण्याचा संकल्प करायला हवा. संक्रांती म्हणजे संघ क्रांती. “संघे शक्ती कलौ युगे”. संघामध्ये शक्ती विपुल प्रमाणात एकत्र आल्याने कठीण कार्यही सहजगत्या पार पडते. हा सण –उत्सव लोकांना जोडण्याचे काम करतो. म्हणून आनंद सुसंवाद आणि ऐक्‍याचे प्रतीक मानला जातो. अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा मार्ग (संक्रांत). (तमसो मा ज्योतिर्गमय).

संक्रांतीला तीळ  (स्नेह) आणि (गुळ)  गोडी याला महत्व आहे. आयुर्वेद शास्त्रानुसार थंडीच्या दिवसात रुक्ष झालेल्या शरीराला स्निग्धतेची  गरज असते. ती गरज भागविणारे तीळ हे सर्वोत्तम खाद्य आहे. आहारात वापरणे प्रकृतीला लाभदायक ठरते. तसेच तीळयुक्त पाण्याने  स्नान करतात. अध्यात्मानुसार  तिळात कोणत्याही इतर तेलापेक्षा, सत्व लहरी ग्रहण करण्याची क्षमता जास्त असल्याने, सूर्याच्या संक्रमण काळात साधना चांगली व्हायला, सर्वोत्तम मानले जातात. तिळाचे तेलही पुष्टीप्रद असते. या दिवशी ब्राह्मणांना दान, शिवमंदिरात तिळाच्या तेलाचे दिवे  लावतात. पितृ श्राद्ध करून, तिलांजली देऊन, तर्पण करतात.तिळामुळे असुर श्राद्धात विघ्न आणत नाहीत, अशी समजूत आहे. जेवणात गुळाच्या किंवा पुरणपोळ्या करतात. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी पद्धत आहे .आप्तेष्टांना तिळगुळाची वडी किंवा लाडू देऊन, “तिळगुळ घ्या,गोड गोड बोला” असे शब्द उच्चारले जातात.

“तिलवत वद  सस्नेहमं, गुडवत मधुरम वद । 

उभयस्य प्रदानेन  स्नेहवृद्धीः  चिरं भवेत ।।”

अशी सदिच्छा व्यक्त केली जाते. काहीजण पुण्यकाळ व महापुण्य काळ मुहूर्तावर सूर्यदेवाला अर्घ्य देऊन, पूजा करून ,आरती करून, सूर्य मंत्र  २१ किंवा १०८वेळा पठण  करतात. पूजेच्या वेळी काही भाविक 12 मुखी रुद्राक्ष धारण करतात. त्यामुळे चेतना व वैश्विक बुद्धिमत्ता बऱ्याच पातळ्यां पर्यंत वाढून, कामे यशस्वी होतात अशी समजूत आहे. भगवान शनिदेव मकर राशीचे स्वामी असल्याने, जप ,तप ,ध्यान आदी धार्मिक क्रियांना महत्त्व आहे. संक्रांतीला नवीन लग्न झालेल्या मुलीला, सासरचे काळी साडी, हलव्याचे दागिने आणि तिळगुळ आणतात. तसेच जावयाला हलव्याचा हार, गुच्छ ,चांदीच्या वाटीत तिळगुळ घालून देतात. लहान बाळालाही काळे कपडे, हलव्याचे दागिने घालून, बोरन्हाण घालतात. (चिरमुरे, बोरं, भेंड, बत्तासे, चॉकलेट वगैरे). थंडीचे दिवस असल्याने काळा रंग  ऊब  देत असल्याने, काळे कपडे घेण्याची पद्धत असावी. स्त्रिया हळदीकुंकू करून तिळगुळ व दान देतात.

क्रमशः….

©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

बुधगावकर मळा रस्ता, मिरज.

मो. ९४०३५७०९८७

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित/सौ.मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मकर संक्रांत….भाग-1 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

?  विविधा ?

☆ मकर संक्रांत….भाग-1 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

हिंदू संस्कृतीतील इंग्रजी तारखेप्रमाणे येणारा एकमेव सण म्हणजे मकर संक्रांत — संक्रमण. संक्रांतीचा सण हा निसर्गाचा उत्सव आहे .भारत हा कृषिप्रधान देश असल्याने निसर्गाशी, शेतीशी निगडित असा हा उत्सव आहे. 22 डिसेंबर पासून उत्तरायणाला सुरुवात झाली तरी, सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो ,म्हणजे संक्रमण करतो, तो दिवस 14 जानेवारी. सूर्य भ्रमणामुळे पडणारा फरक भरून काढण्यासाठी, दर 80 वर्षांनी संक्रांतीचा दिवस एक दिवस पुढे ढकलला जातो. व 15 जानेवारीला संक्रांत येते. यानंतर दिवसाचा काळ मोठा, आणि रात्रीचा काळ लहान व्हायला सुरुवात होते. धार्मिक हिंदू लोक उत्तरायणात मृत्यू यावा, असा जप करतात. मृत्यूलाही थांबवून धरणारे पितामह भीष्म हे उत्तम उदाहरण आहे.

संपूर्ण देशभर या सणाला महत्त्व आहे. वेगवेगळ्या प्रदेशानुसार त्याची नावे आणि साजरा करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. महाराष्ट्रात संक्रांत, तामिळनाडूमध्ये पोंगल, कर्नाटक आणि केरळ मध्ये संक्रांति ,उडुपी भागात संक्रमण, तर काही ठिकाणी, यादिवशी सूर्याने उत्तरायणी चळवळ सुरू केली, म्हणून त्यास उत्तरायणी असेही म्हणतात .तसेच शेतात धान्याची कापणी चालू असते, म्हणून कापणीचा सण, असेही म्हणतात .तेलगू त्याला पेंडा पाडुंगा , बुंदेलखंडात सकृत, उत्तरप्रदेश बिहार मध्ये, खिचडी करून सूर्याला अर्पण करून, दानही  दिले जाते, म्हणून या दिवसाला खिचडी असेच  म्हणण्याची प्रथा आहे. गंगासागर मध्ये या दिवशी खूप मोठा मेळावा भरवला जातो. हिमाचल हरियाणामध्ये मगही आणि पंजाब मध्ये लोव्ही म्हणतात. मध्यप्रदेशात सक्रस, जम्मूमध्ये उत्तरैन, काश्मीर घाटी मध्ये    शिशुर संक्रांती, आसाम मध्ये भोगाली बिहू, तर ओरिसामध्ये आदिवासी या दिवशी पासून नवीन वर्ष सुरू करतात. केरळ मध्ये तर हा उत्सव  ७–14 –21           किंवा  40 दिवसांचाही करून, संक्रांति दिवशी त्याची सांगता करतात. गुजरात मध्ये आजही तिळाच्या लाडू मध्ये  दान घालून गुप्त दान देण्याची पद्धत आहे. तसेच तेथे पतंग उडविण्याच्या स्पर्धाही घेतल्या जातात. त्यामागील शास्त्र म्हणजे, पतंग उडविण्यासाठी मैदानात किंवा गच्चीत जावे लागते. आणि आपोआपच  सौरस्नान घडते. सूर्याच्या संक्रमणाशी जीवनाचे संक्रमणही  जोडलेले आहे. त्यादृष्टीने या उत्सवाचे सांस्कृतिकदृष्ट्याही खूप महत्त्व आहे.

सूर्याचा ( पृथ्वीचा ) धनु रास ते मकर रास या प्रवासाच्या काळाला धुंधुरमास किंवा धनुर्मास म्हणतात.( 13 डिसेंबर ते 1३ जानेवारी). मकर संक्रांतीच्या आदला दिवस म्हणजे भोगी. हा धनुर्मासाचा शेवटचा दिवस. याबाबत पुराणातही एक कथा सांगितली आहे. या काळात एखाद्या दिवशी तरी पाहाटे स्वयंपाक करून, उगवत्या सूर्याला नैवेद्य दाखवण्याची प्रथा आहे.

आपल्याकडे संक्रांत हा तीन दिवसाचा उत्सव साजरा करतात. भोगी, संक्रांत ,आणि किंक्रांत.

भोगी दिवशी  सुगडाच्या (सुघटचा अपभ्रंश  सुगड असा असावा ). पूजेचे महत्व असते. मातीची नवीन गाडगी, ( घट) कोणी दोन, कोणी पाच अशी आणून, त्यापैकी एका मध्ये अगदी छोटी बोळकी ,(ज्याला चिल्लीपिल्ली म्हणतात). घालतात. ऋतूप्रमाणे शेतातून आलेले गाजर, घेवडा, शेंगा, सोलाणा, ऊस, बोर, तिळगुळ, असे जिन्नस त्यामध्ये भरून, ती देवापुढे ठेवून , त्याची पूजा करतात. एका सुपामध्ये बाजरीचे पीठ ,शेंगा, पातीचा कांदा ,मुगाची डाळ, तांदूळ, लोणी, वस्त्र, विड्याचे पान, दक्षिणा, सुपारी, इतकच नाही तर अगदी स्नानासाठी शिकेकाई, खोबरेल तेल असे सर्व ठेवून ते  वाण स्नानापूर्वी एखाद्या सुवासिनीला  देण्याची पद्धत आहे .या दिवशीच्या स्वयंपाकात  तीळ लावून  बाजरीच्या भाकरी राळ्याचा भात किंवा खिचडी आणि वरील सर्व भाज्या एकत्र करून केलेली भाजी  (या भाजीला लेकुरवाळी असे नाव आहे.) भरपूर लोणी, दही असा हा आरोग्यदायी घाट असतो.

क्रमशः….

©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

बुधगावकर मळा रस्ता, मिरज.

मो. ९४०३५७०९८७

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित/सौ.मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ चं म त ग ! अल कपोने आणि दयाळू काल्या दादा! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक

श्री प्रमोद वामन वर्तक

? विविधा ?

? चं म त ग ! ⭐ श्री प्रमोद वामन वर्तक ⭐

? अल कपोने आणि दयाळू काल्या दादा ! ?

“अगं ऐकलंस का, चहा टाक बघू फक्कडसा, मग तो घेता घेता तुला आणलेली एक वस्तू दाखवतो !”

“असं बोलून तुम्ही उगाच आशा लावता आणि ती वस्तू नंतर नेहमी फुसका बारच ठरते !”

“अगं आज आधी आणलेली वस्तू एकदा बघ तर खरी, मग ठरव फुसका बार आहे का ऍटोम बॉम्ब आहे ते !”

“ठीक आहे ! फुसका बार निघाला तर खाली इराण्याकडे जाऊन कटिंग पिऊन यायचा आणि ऍटोम बॉम्ब निघाला तर घरच्या आल्याच्या चहा बरोबर क्रीम बिस्कीटं मिळतील तुम्हांला !”

“ठीक आहे !  हा बघ नऊ इंच धारदार पात असलेला, गेल्या शतकातला रामपुरी चाकू !”

“उ s s ठा, ताबडतोब उ s s ठा आणि खाली इराण्याकडे जाऊन कटिंग चहा पिऊन या !”

“अगं पण माझं जरा ऐकून तर…”

“काय ऐकायचं तुमच ? घरात पाच पाच वेगवेगळे चाकू, सुऱ्या असतांना, हा रामपुरी चाकू कशाला आणलाय तुम्ही? त्याने मी काय सगळी कामं सोडून मर्डर करत सुटू की काय ?”

“अगं अशी डोक्यात राख नको घालून घेऊ ! या रामपुरीने पण अनेक खरे खून केले आहेत त्या….”

“आणि असा रामपुरी चाकू तुम्ही मला देताय आणि वर चहा मागताय ? आज आता तुम्हांला दिवसभर चहाच काय, नाष्टा, जेवण काहीच मिळणार नाहीये, कळलं ?”

“अगं जरा बैस आणि शांतपणे मी काय म्हणतोय ते ऐकून तरी घे आणि मग बोल !”

“ठीक आहे, बोला पटपट, मला भरपूर कामं पडली आहेत घरात !”

“अगं हा रामपुरी चाकू साधासुधा नाही ! याची नक्षीदार मूठ बघितलिस का ?”

“त्यात काय बघायचं? सोनेरी रंगाची आहे म्हणून….”

“अगं वेडाबाई ती खऱ्या चांदीवर सोन्याच पाणी दिलेली मूठ आहे !”

“काय सांगताय काय ?”

“मग ? अगं हा रामपुरी खास आहे म्हटलं ! गेल्या शतकात आपल्याकडे होऊन गेलेल्या ‘दयाळू काल्या दादाचा’ आहे हा !”

“अहो पण हा तुम्हाला मिळाला कुठे ?”

“अगं आपल्याकडे जी ‘दानी आणि मनी’ नावाची लिलाव संस्था आहे ना तिथून हा मी लिलावात घेतला, अँटिक पीस म्हणून !”

“मी पण ऐकून आहे त्या संस्थे बद्दल, जी लिलावातून आलेल्या अर्ध्या पैशाचे गरजूना दान करते !”

“बरोब्बर !”

“पण केवढ्याला घेतलात हा रामपुरी चाकू ते सांगा ना ?”

“अगं त्याची एक गंमतच झाली ! त्या संस्थेच्या लीलावातील सगळ्या दुसऱ्या वस्तू खूपच चढया भावाने गेल्या, पण या रामपुरी चाकूला कोणी बोलीच लावे ना !”

“का हो ?”

“अगं असं काय करतेस ? याच रामपुरीने ‘दयाळू काल्या दादाने’ तेरा श्रीमंत सावकारांचे मर्डर केले होते ना ?”

“आणि असा चाकू तुम्ही घरात घेवून आलात ? आधी तो फेकून…..”

“अगं माझं जरा ऐक ! त्या दादाने गेल्या शतकात श्रीमंत सावकारांचे मर्डर केले असले तरी त्याने त्यांचे धन गरीब लोकांतच वाटले ! म्हणून तर त्याला ‘दयाळू काल्या दादा’ म्हणतात !”

“पण हा रामपुरी आपण घ्यावा असं का वाटलं तुम्हांला ?”

“अगं त्याच काय झालं सांगतो. परवाच पेपरात एक बातमी वाचली ! परदेशातल्या जगप्रसिद्ध ‘सदबी’ या लिलाव कंपनीने, गेल्या शतकात इटालीत होऊन गेलेल्या ‘अल कपोने’ या कुप्रसिद्ध ‘गॉडफादरचे’ पिस्तूल अडीच कोटी रुपयांना, कॅलिफोर्नियात झालेल्या लिलावात विकले म्हणून ! अगं त्या पिस्तूलानेच त्या कुप्रसिद्ध ‘अल कपोनेने’ दोनशे जणांचा खून केला होता !”

“बापरे !”

“पण मजा अशी, की त्याच्यावर शेवट पर्यंत एकाही खुनाचा गुन्हा सिद्ध होऊ शकला नाही बोल ! पण हां, त्याला ‘टॅक्स’ चुकवल्या प्रकरणी दोषी ठरवून फक्त साडे सात वर्षाची शिक्षा झाली !”

“कठीणच आहे सगळं!”

“अगं पण तो वर बसला आहे ना तो सगळं बघत असतो बघ ! वयाच्या फक्त ४८ व्या वर्षी एका दुर्धर आजाराने त्याचे निधन झाले.”

“ते सगळं ठीक, पण हा रामपुरी….”

“अगं एकदम स्वस्तात मिळाला !”

“खऱ्या चांदीची मूठ आणि त्यावर सोन्याचं पाणी दिलेला, तरी स्वस्तात कसा काय मिळाला ?”

“त्याच कारण म्हणजे त्या रामपुरी चाकूने गेल्या शतकात झालेले तेरा खून ! त्यामुळे त्या चाकूला कोणी लोकं बोलीच लावायला तयार होईनात, हे मी तुला मगाशी बोललोच.”

“बरोबरच आहे लोकांचं, असा खुनी चाकू कोण कशाला घरात….”

“हो, पण त्यामुळे ‘दानी आणि मनी’ कंपनीचे धाबे दणाणलं आणि त्यांनी त्याच्या बेस प्राईस पेक्षा खालची बोली स्वतःच डिक्लेर केली !”

“बापरे”

“तरी कोणी तो घ्यायला तयार होईना ! शेवटी कंपनीने स्वतःच एकशे एक किंमत डिक्लेर केली तरी सगळे गप्प !”

“मग ?”

“मग शेवटी मीच एक्कावन्न रुपयाची बोली लावली आणि ती कबूल होऊन मी हा अँटिक रामपुरी चाकू घरी घेवून आलो !”

“हो पण आपण याच करायचं काय ?”

“आपण काहीच नाही करायच ! हा असाच शोकेस मधे ठेवून द्यायचा ! जे काही करायच ते आपल्या नातवाने मोठा झाल्यावर !”

“म्हणजे ?”

“अगं तो मोठा झाल्यावर जेंव्हा हा अँटिक रामपुरी तो पुन्हा एखाद्या लिलावात विकेल, तेव्हा त्याला नक्कीच कमीत कमी पन्नास लाख तरी मिळतील बघ !”

“कमाल आहे बाई तुमची ! आत्ता आणते आल्याचा चहा आणि क्रीम बिस्कीटं !”

असं बोलून बायको हसत हसत किचनकडे पळाली आणि मी नातवाला त्याच्या तरुणपणी मिळणाऱ्या पन्नास लाखावर, बोटं कापली जाणार नाहीत याची दक्षता घेत हळुवार हात फिरवत, चहाची आणि क्रीम बिस्कीटांची वाट बघत बसलो !

 

© श्री प्रमोद वामन वर्तक

(सिंगापूर) +6594708959

मो – 9892561086

ई-मेल – pradnyavartak3@gmail.com

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मी तिळगुळ संक्रात… ☆ सौ राधिका भांडारकर

सौ राधिका भांडारकर

?विविधा ?

☆ मी तिळगुळ संक्रात… ☆ सौ राधिका भांडारकर ☆

मी..अगबाई! नवं वर्षंउगवलं.जानेवारी महिना सुरु झाला. आता संक्रातीचे वेध लागले.   .स्वच्छ तीळ चिकीचा गुळ आणायलाच हवा..शिवाय सुगडी..बोरं ऊस आवळे..कितीही ठरवलं ना या वेळेस चितळेकडूनच आणूया लाडू,आता नाही हो होत…पण मन नाही ना मानत..नाही म्हटलं तरी  संस्काराची मूळं नाही सुटत हो..

पण अधिक माहिती देण्यासाठी संक्रात आणि तिळगुळ माझ्या घरीच आले आहेत..अम्मळ बोलूच या का त्यांच्याशी..

काय म्हणताय् तिळगुळजी..

तिळगुळ…सर्वप्रथम मी तुझं कौतुकच करतो की या वयातही तू अजुन तीळगुळ घरी बनवतेस…

संक्रात..अरे पण तुझं महत्व सांग ना..नाही जमत सगळ्यांनाच स्वत: बनवायला..महत्वाचं आहे ते तिळगुळाचं  असणं,..

तिळगुळ…हे बघ तिळआणि गुळाचं बंधन म्हणजे मी..तिळगुळ…हेमंत ऋतुत येते संक्रांत..

थंडीची शिरशिरी..तीळ हे उष्णवर्धक ,स्निग्ध.शिवाय त्यातली अॅमीनो प्रथीने ,लोह शरीरास पोषक असतात. गुळातही सुक्रोज आणि ग्लुकोज  आणि लोहअसते .ते .शरीराचे तपमानही राखते अन् कांतीही सतेज राहते…म्हणून संक्रातीला माझे महत्व असते बरं का?शिवाय स्नेह आणि मैत्रीचे मी प्रतीक.राग हेवे दावे विसरून जायचे.नवे स्नेहसंबंध प्रस्थापित करायचे..तीळगुळ घ्या गोड बोला म्हणत आनंदाचे, प्रेमाचे बंध जोडायचे..

मी..किती छान!!आपल्या भारतीय सणातली ही तत्वंच महत्वाची..

संक्रांत…अगदी बरोबर!

मी..पण संक्रातबाई,,”काय बाई संक्रांत आली माझ्यावर..”असं लाक्षणिक अर्थानं ,थोडंसं कडवट कां बरं बोलतात!!

संक्रांत…कारण यावेळी एका राशीतून दुसर्‍या राशीत प्रवेश करणं असतं ना..१४जानेवारीला सूर्य मकर राशीत प्रवेश करतो.आणि या भ्रमणास मकर संक्रांत असं म्हणतात.याचवेळी उत्तरायण सुरु होते.हा काळ धर्म परंपरेच्या दृष्टी कोनातून अत्यंत महत्वाचा आणि पवित्र मानला जातो. अन्न ,वस्तु यांचं दान केलं जातं..

सूर्याची पूजा केली जाते.शुक्राचाही उदय होतो..

मी ..भारतात संक्रातीला वेगवेगळी नावेही आहेत ना..

संक्रांत..हो .तामीळनाडुत पोंगल असतो.बिहार मधे तर मला खिचडीही म्हणतात…

मी ..खिचडी?

संक्रांत…हो.कारण या दिवशी तुर मसुर तांदुळाची खिचडी बनवून खायचीही प्रथा आहे.

तीळाचे लाडु ,वड्या ,रेवडी गजक गुळपोळी या खाद्य पदार्थांची तर रेलचेलच असते…

मी..वा!!किती छान माहिती मिळाली.भारतीय सण म्हणजे नुसतीच संस्कृती किंवा परंपरा नव्हे, त्यामागे शास्त्रीय विचार आहे.बदलणार्‍या ऋतुमानाचा आणि मानवी जीवनाचा केलेला वैज्ञानीक अभ्यास आहे…मग स्त्रीयांसाठी हळदीकुंकु,वाण वाटणे ,लहान मुलांचे बोर नहाण पतंग उडवणे या आनंदकृती असल्या तरी भारतीय कृषीपरंपरेला आणि निसर्गाला मानणार्‍या आहेत…आनंदाचे संकेत आहेत.

खरोखरच आज मला मी,तीळगुळ आणि संक्रांत यातील परस्पर संबंध डोळसपणे जाणता आले…

चला तर मग तिळगुळ घ्या अन् गोड बोला…..

 

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares