मराठी साहित्य – विविधा ☆ चं म त ग ! ☆ ना गी ण ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक

श्री प्रमोद वामन वर्तक

? विविधा ?

? चं म त ग ! ⭐ श्री प्रमोद वामन वर्तक ⭐

? ना गी ण ! ??

रविवार असल्यामुळे, नाष्टा वगैरे करून फुरसतीत दाढी करत होतो आणि तेवढ्यात दारावरची बेल वाजली. तोंड फेसाने माखल्यामुळे बायकोला म्हटलं, “बघ गं जरा कोण तडमडलय सकाळी सकाळी ते !” “बघते !” असं बोलत बायकोने दरवाजा उघडला. “मकरंद भावजी तुम्ही एवढ्या सकाळी आणि ते ही लुंगीवर आणि हे तुमच्या बरोबर कोण आलंय ?” हिचा तो तार स्वर ऐकून मी घाबरलो आणि टॉवेलने तोंड पुसत पुसत बाहेर आलो. “काय रे मक्या, काय झालंय काय असं एकदम माझ्याकडे लुंगीवर येण्या इतकं?” “वारेव्वा, मला काय धाड भरल्ये ? अरे तुलाच ‘नागीण’ चावल्ये ना ? वहिनी म्हणाल्या तसं मोबाईलवर, म्हणून शेजारच्या झोडपट्टीत राहणाऱ्या ह्या ‘गारुडयाला’ झोपेतून उठवून आणलंय, तुझी नागीण उतरवायला !” “अरे मक्या गाढवा नागीण चावली नाही, नागीण झाल्ये मला !” “असं होय, मला वाटलं चावल्ये, म्हणून मी या गारुड्याला घेवून आलो !” मी गारुड्याला म्हटलं “भाईसाब ये मेरे दोस्त की कुछ गलतफईमी हुई है ! आप निकलो.” “ऐसा कैसा साब, मेरी निंद खराब की इन्होने, कुछ चाय पानी….” मी गपचूप घरात गेलो आणि पन्नासची नोट आणून त्याच्या हातावर नाईलाजाने ठेवली. तो गारुडी गेल्यावर मी मक्याला म्हटलं “अरे असं काही करण्या आधी नीट खात्री का नाही करून घेतलीस गाढवा ? आणि नागीण चावायला आपण काय जंगलात राहतो का रे बैला ?” पण मक्या तेवढ्याच शांतपणे मला म्हणाला “अरे जंगलात नाहीतर काय ? ही आपली ‘वनराई सोसायटी’ आरे कॉलनीच्या जंगलाच्या बाजूला तर आहे ! आपल्या सोसायटीत रात्री अपरात्री बिबट्या येतो हे माहित नाही का तुला ?” “अरे हो पण म्हणून…” “मग नागीण का नाही येणार म्हणतो मी ? गेल्याच आठवड्यात बारा फुटी अजगर पकडाला होता ना आपल्या पाण्याच्या टाकी जवळ, मग एखादी नागीण…” शेवटी मी त्याची कशी बशी समजूत काढली आणि त्याला घरी पिटाळलं !

पण मक्या गेल्या गेल्या बायको मला म्हणाली, “आता साऱ्या ‘वनराईत’ तुमच्या या नागिणीची बातमी जाणार बघा !” “ती कशी काय ?” “अहो आपल्या ‘वनराई व्हाट्स ऍप गृपचे’ मकरंद भाऊजी ऍडमिन आणि अशा बातम्या ते ग्रुपवर लगेच टाकतात !” तीच बोलणं पूर होतंय न होतंय तोच आमच्या दोघांच्या मोबाईलवर, एकाच वेळेस मेसेज आल्याची बेल वाजली ! बायकोच भाकीत एवढ्या लवकर प्रत्यक्षात उतरेल असं वाटलं नव्हतं ! तो मक्याचाच व्हाट्स ऍप मेसेज होता ! “आपल्या ‘वनराईत’ बी बिल्डिंगमध्ये राहणारे वसंत जोशी यांना नागीण झाली आहे. तरी यावर कोणाकडे काही जालीम इलाज असल्यास त्यांनी लगेच जोशी यांच्याशी संपर्क साधावा, ही कळकळीची नम्र विनंती !” मी तो मेसेज वाचला आणि रागा रागाने मक्याला झापण्यासाठी मोबाईल लावणार, तेवढ्यात परत दाराची बेल वाजली ! कोण आलं असेल असा विचार करत दरवाजा उघडला, तर वरच्या मजल्यावरचे ‘वनराईतले’ सर्वात सिनियर मोस्ट गोखले अण्णा दारात काठीचा आधार घेत उभे !

“अण्णा, तुम्ही ? काही काम होत का माझ्याकडे ?” “अरे वश्या आत्ताच मक्याचा व्हाट्स ऍप मेसेज वाचला आणि मला कळलं तुला नागीण झाल्ये म्हणून ! म्हटलं चौकशी करून यावी आणि त्यावर माझ्याकडे एक जालीम उपाय आहे तो पण सांगावा, म्हणून आलो हो !” “अण्णा माझे डॉक्टरी उपाय चालू आहेत, बरं वाटेल एक दोन….” मला मधेच तोडत अण्णा म्हणाले “अरे वश्या ह्या नगिणीवर आलो्फेथीचे डॉक्टरी उपाय काहीच कामाचे नाहीत बरं !” “मग?” “अरे तिच्यावर आयुर्वेदिकच उपाय करायला हवेत, त्या शिवाय ती बरं व्हायचं नांव घेणार नाही, सांगतो तुला!” “पण डॉक्टर म्हणाले, तसा वेळ लागतो ही नागीण बरी व्हायला, थोडे पेशन्स ठेवा!” “अरे पण पेशन्स ठेवता ठेवता तीच तोंड आणि शेपटी एकत्र आली, तर जीवाशी खेळ होईल हो, सांगून ठेवतो !” “म्हणजे मी नाही समजलो ?” “अरे वश्या ही नागीण जिथून सुरु झाल्ये ना ती तिची शेपटी आणि ती तुझ्या कपाळावरून जशी जशी पुढे जात्ये नां, ते तीच तोंड !” “बापरे, असं असतं का ?” “हो नां आणि एकदा का त्या तोंडाने आपलीच शेपटी गिळली की खेळ खल्लास!” “काय सांगताय ? मग यावर काय उपाय आहे म्हणालात अण्णा ?” “अरे काय करायच माहित्ये का, रात्री मूठ भर तांदूळ भिजत घालायचे आणि सकाळी मूठभर हिरव्यागार दुर्वा आणून त्यांची दोघांची पेस्ट करून त्याचा लेप करून या नागिणीवर लावायचा ! दोन दिवसात आराम पडलाच म्हणून समज !” “अहो अण्णा, पण नागीण आता कपाळावरून केसात शिरत्ये, मग केसात कसा लावणार मी लेप ?” “वश्या तुझ्याकडे इलेक्ट्रिक रेझर असेलच ना, त्याने त्या सटवीच्या मार्गातले केस कापून टाक, म्हणजे झालं !” “अण्णा पण कसं दिसेल ते ? डोक्याच्या उजव्या डाव्या बाजूला रान उगवल्या सारखे केस आणि मधून पायावट! हसतील हो लोकं मला तशा अवतारात !” “हसतील त्यांचे दात दिसतील वश्या ! तू त्यांच हसणं मनावर घेवू नकोस!” “बरं बघतो काय करता येईल ते !” अण्णांना कटवायच्या हेतूने मी म्हणालो. “नाहीतर असं करतोस का वश्या, सगळं डोकंच भादरून टाक, म्हणजे प्रश्नच मिटला, काय ?” “अहो अण्णा, पण तसं केलं तर लोकं वेगळाच प्रश्न नाही का विचारणार ?” “ते ही खरंच की रे वश्या ! तू बघ कसं काय करायच ते, पण त्या सटविच तोंड आणि शेपटी एकत्र येणार नाही याची काळजी घे हो बरीक ! नाहीतर नस्ती आफत ओढवायची !” असं म्हणून अण्णा काठी टेकत टेकत बाहेर पडले आणि मी सुटकेचा निश्वास टाकला !

मी किचनकडे वळून म्हटलं “अगं जरा चहा टाक घोटभर, बोलून बोलून डोकं दुखायला लागलंय नुसतं !” आणि सोफ्यावर बसतोय न बसतोय तर पुन्हा दाराची बेल वाजली ! आता परत कोण तडमडल असं मनात म्हणत दार उघडलं, तर दारात शेजारचे कर्वे काका हातात रक्त चंदनाची भावली घेवून उभे ! मी काही विचारायच्या आत “ही रक्त चांदनाची भावली घे आणि दिवसातून पाच वेळा त्या नागिणीला उगाळून लाव, नाही दोन दिवसात फरक पडला तर नांव नाही सांगणार हा धन्वंतरी कर्वे !” असं बोलून आपल्या शेजारच्या घरात ते अदृश्य पण झाले! ते गेले, हे बघून मी सुटकेचा निश्वास टाकतोय न टाकतोय तर लेले काकू, हातात कसलासा कागदाचा चिटोरा घेवून दारात येवून हजर ! लेले काकूंनी तो कागद मला दिला आणि म्हणाल्या “या कागदावर किनई एका ठाण्याच्या वैद्याच नांव, पत्ता आणि फोन नंबर आहे, ते नागिणीवर जालीम औषधं देतात ! आधी फोन करून अपॉइंटमेंट घ्या बरं ! त्यांच्याकडे भरपूर गर्दी असते, पण लगेच गुण येतो त्यांच्या हाताचा ! आमच्या ह्यांना झाली होती कमरेवर नागीण, पण दोन दिवसात गायब बघा त्यांच्या औषधी विड्याने ! आणि हो काम झाल्यावर हा पत्त्याचा कागद आठवणीने परत द्या बरं का !” एवढं बोलून लेले काकू गुल पण झाल्या !
मी त्या कागदावरचा नांव पत्ता वाचत वाचत दार लावणार, तेवढ्यात ए विंग मधल्या चितळे काकूंनी एक कागदाची पुडी माझ्या हातावर ठेवली आणि “ही आमच्या ‘त्रिकालदर्शी बाबांच्या’ मठातली मंतरलेली उदी आहे ! ही लावा त्या नागिणीवर आणि चिंता सोडा बाबांवर! पण एक लक्षात ठेवा हं, ही उदी लावल्यावर दुसरा कुठलाच उपाय करायचा नाही तुमच्या नागिणीवर, नाहीतर या उदीचा काही म्हणजे काही उपयोग होणार नाही, समजलं ?” मी मानेनेच हो म्हटलं आणि आणखी कोणी यायच्या आत दार बंद करून टाकलं ! आणि मंडळी घरात जाऊन पहिलं काम काय केलं असेल, तर PC चालू करून त्यावर “Please do not disturb !” अस टाईप करून त्याची मोठ्या अक्षरात प्रिंटरवर प्रिंट आउट काढली आणि परत दार उघडून पटकन बाहेरच्या कडीला अडकवून दार लॉक करून, शांतपणे सोफ्यावर आडवा झालो !

© श्री प्रमोद वामन वर्तक

(सिंगापूर) +6594708959

मो – 9892561086

ई-मेल – [email protected]

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ भोग जे येती कपाळी ☆ सुश्री प्रज्ञा मिरासदार

? विविधा ? 

☆ भोग जे येती कपाळी ☆सुश्री प्रज्ञा मिरासदार ☆ 

एक म्हातारी साधारण साठ एक वयाची रस्त्याच्या कडेला रडत बसलेली दिसली. चांगल्या घरातली वाटत होती. कुणी असं दिसलं की नकळतच माणुसकी जागी होतेच. तसेच मीही तिच्या जवळ गेले आणि विचारलं ” काय झालं आजी? रडताय का?” तशी ती म्हणाली ” भोग आहेत भोग! माझ्या नशिबाचे भोग भोगतीय मी!” रडणं थांबत नव्हतंच.मग तिला पाणी दिलं. इतरांच्या मदतीनं तिला उचललं. एका बऱ्याशा हॉटेलमध्ये नेलं. खाऊ पिऊ घातलं. नंतर तिला बोलतं केलं. तिनं सांगितलेली तिची हकिकत अंगावर काटा आणणारी होती.

तिचा नवरा कोरोनानं गेला. बऱ्यापैकी पैसा तो बाळगून होता. मुलगा सून नातवंडे , स्वतः चं घर ,सगळं व्यवस्थित होतं. पण अलीकडे सुनेला ती घरात नकोशी झाली होती. सुनेच्या सांगण्यावरून मुलानं तिच्या बॅ॑क अकाउंटला स्वतः ची नावे लावली होती. आणि हळूहळू तिच्या सगळ्या पैशांवर डल्ला मारला.आज तर कहरच झाला होता. मुलगा घरी नाही हे पाहून सुनेने तिला घराबाहेर हाकलून दिलं . आणि वर पुन्हा धमकी दिली की परत आलात तर मीच रॉकेल ओतून पेटवून घेईन.

“आता याला काय म्हणायचं? माझंच नशीब फिरलं.भोग का भोगायला लावतोय देव मला? काय वाईट केलं मी कुणाचं?” म्हातारीच्या रडण्याला अंत नव्हता. अगदी करूण प्रसंग होता.

भोग!!! का भोगायला लावतो देव आपल्याला? या प्रश्नाचं उत्तर काही सापडत नाही. प्रत्येकाच्या वाट्याला कमी जास्त प्रमाणात भोग हे भोगावेच लागतात.देवादिकांनाही भोग चुकले नाहीत. राम, कृष्ण या सर्व मानवी अवतारात देवानेही भोग भोगले. संत ज्ञानेश्वर, त्यांची भावंडे, संत तुकाराम महाराज, संत चोखामेळा वगैरे संतांना सुद्धा

भोगांनी सोडले नाही.तिथं तुमची आमची काय कथा?? स्वरूप वेगवेगळं असतं. पण दु:ख म्हणजे भोग का? की सुखाचेही असतात भोग? देवानं सगळ्यांना सुख दुःख दिलंय. कुणाच्या वाट्याला कमी जास्त सुख दुःख आहेच. जे नशिबी येतात ते भोग भोगावेच लागतात.

कोणाला ते भोग भोगण्याची ताकद असते किंवा येते.म्हणजेच मनाचा खंबीरपणा त्याच्याकडे असतो. जो मनाने दुबळा , कमकुवत असतो.त्याला भोगातून दु:खच वाट्याला येतं.त्यातूनच माणसाला क्वचित शहाणपण येतं.

भोग आणि उपभोग या अगदी भिन्न गोष्टी आहेत. त्या उपभोगाला सुख या शब्दाची झालर आहे. हे उपभोग सुखासाठीच असतात. अर्थात त्या उपभोगांनी सुख मिळतं की नाही ,कुणास ठाऊक!!! पण माणसांची प्रवृत्ती उपभोगाकडे जास्त झुकते. एकदा का उपभोगाची सवय झाली की ते उपभोग नाही मिळाले तर माणसाला तेच आपले भोग आहेत असे वाटते. म्हणजेच भोग हे निरनिराळ्या प्रकारचे असतात. ते भोगायला लागतातच. त्यांची तीव्रता तुम्ही त्याला कसे तोंड देता यावर कमी जास्त होते.

“भोग जे येती कपाळी, ते सुखाने भोगतो”

असं कविवर्य सुरेश भट म्हणतात. एखाद्या स्त्रीचा पती अकाली गेला, तिच्या वाट्याला फरफट आली तर ते तिचे भोग झाले. पण एखाद्या स्त्रीचा पती म्हातारपणी, अंथरूणाला खिळून होता, नंतर गेला तर तो ‘सुटला’ असं वाटतं. ते त्या  स्त्रीचे भोग ठरत नाहीत. म्हणजे परिस्थिती नुसार भोगाची किंमत होते. कमकुवत मन असलेला कमजोर पडतो आणि आत्महत्येसारखा दुर्दैवी मार्ग अवलंबितो.

भोगातून बाहेर पडण्यासाठीही माणूस मार्ग शोधतो. देवधर्म, उपासतापास, नवससायास,हे मार्ग अवलंबितो. स्वतःचं मन स्थिर ठेवणं हा उपाय येथे महत्वाचा आहे. त्यासाठी जप, नाममंत्र, गुरूपदेश यांचाही आधार घेतला जातो. कुणी साधनेचा मार्ग चोखाळतात. तर कुणी साधनेच्या नावाखाली मूळ मुद्द्यापासून दूर पळतात.

योग, प्राणायाम, योग्य व्यायाम, नेहमी नकारात्मक विचार न करता चांगला , सकारात्मक विचारच करणे इत्यादी गोष्टींनी मन स्थिर राहण्यास मदत होते.

एकदा भोग भोगून झाले की ते पुन्हा येणार नाहीत याचाही भरवसा नसतो. जे खरोखर नशीबवान , त्यांना नसतील लागत ते भोगायला. पण काहींच्या नशिबी खरंच काही अडचणी, भोग ठाण मांडून बसलेले असतात.

खरोखरच साधना करून किंवा कोणी चांगला गुरू भेटला तर यातून तो मार्ग दाखवू शकतो. त्यासाठी देवांवर, गुरूंवर ,माणसाची दृढ श्रद्धा, भक्ती, विश्वास हवा. पंढरपूरला आषाढीच्या सोहळ्याला माणसांचा महासागर लोटतो. ते केवळ एका पांडुरंगाच्या श्रद्धेपोटी, भक्तीपोटीच!! त्या बिचाऱ्या वारकऱ्यांच्या नशिबात भोग नसतील का? असतीलच!!! पण विठोबाच्या चरणापाशी आल्यावर त्यांना त्यांच्या भोगांचा तात्पुरता विसर तरी पडतो.

म्हणजेच जे देवाने दिले, दैवाने दिले ते भोग सुखाने भोगावेत. त्यासाठी श्रद्धा, भक्ती, साधना आवश्यक आहे. बाकी आपापल्या भोगातून सुटका कशी करून घ्यायची हे ज्याचे तोच जाणतो.

राहता राहिला प्रश्न त्या म्हातारीचा!! तर तिला महिला बाल कल्याण समिती कडे सुपूर्द करून तिचे भोग कमी करण्याचा थोडा तरी प्रयत्न केला आहे.

© सुश्री प्रज्ञा मिरासदार

पुणे 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ समाज प्रबोधनाचे सरदार: गं .बा. सरदार ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

? विविधा ?

☆ समाज प्रबोधनाचे सरदार: गं .बा. सरदार ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर 

गंगाधर बाळकृष्ण सरदार

 (२ ऑक्टोबर १९०८-१ डिसेंबर १९८८)

गंगाधर बाळकृष्ण सरदार यांचं सारं लेखन समाज प्रबोधन आणि समाज परिवर्तन या गोष्टी केंद्रस्थानी ठेवून केलेले आहे. समाजाचे निकोप परिवर्तन व्हायचे असेल, तर सांस्कृतीक विषमता आणि आर्थिक दु:स्थिती नाहीशी व्हायला हवी, अशी त्यांची धारणा होती. त्यांच्या सामाजिक चिंतनाचा प्रभाव स्वाभाविकपणे त्यांच्या साहित्यिक दृष्टीकोणावर पडला आहे. सामाजिक दायित्व ते मानतात, त्यामुळेच साहित्याची निखळ कलावादी भूमिका त्यांना मान्य नाही.

गं .बा. सरदार यांचा जन्म ठाणे जिल्ह्यातील जव्हार गावी झाला. त्यांचे शिक्षण जव्हार, पुणे, मुंबई इथे झाले. त्यानंतर नाथाबाई दामोदर ठाकरसी या महिला विद्यालयात मराठीचे व्याख्याते म्हणून त्यांची निवड झाली. ६८ला ते मराठीचे प्रपाठक  म्हणून निवृत्त झाले.

जव्हार मध्ये आदिवासी बहुसंख्येने आहेत. त्यामुळे त्यांचे जीवन, त्यांची दु:खे, समस्या इ.शी त्यांची जवळून ओळख झाली. घरातील वातावरणही समतावादी होतं.त्यामुळे सामाजिक भेदाभेदापलीकडे जाऊन माणूस म्हणून पाहण्याची दृष्टी त्यांना लाभली.

शालेय जीवनात स्वामी रामतीर्थ, रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद यांचा त्यांच्यावर प्रभाव पडला होता. सावरकरांच्या विचारांनेही त्यांना काही काळ मोहित केलं होतं. नंतर ते गांधीवादाकडे वळले होते. मिठाच्या सत्याग्रहात ते सामील झाले होते आणि त्यासाठी त्यांना तुरूंगवासही भोगावा लागला होता. पण पुढे बदलत्या काळात, त्यांना गांधीवादाचे अपूरेपण जाणवू लागले. मग ते साम्यवादी विचारधारेकडे ओढले गेले. सक्रीय राजकरणाकडे न वळता, ते लेखन-भाषण याद्वारे समाज प्रबोधन करू लागले. त्यांची ग्रंथसंपदा पहिली तरी त्यांचे समाज प्रबोधनाशी असलेले अतूट नाते लक्षात येईल.

अर्वाचीन मराठी गद्याची पूर्वपीठिका हा त्यांचा पहिला ग्रंथ १९३७ साली प्रसिद्ध झाला.  १८८५ ते १९२० या कालखंडात मराठी गद्याचा विकास झाला, त्याची पार्श्वभूमी अव्वल इंग्रजी काळातील मराठी गद्यलेखकांनी कशी तयार करून ठेवली, याचे विवेचन त्यांनी यात केले आहे. त्यासाठी त्यांनी १८०० ते १८७४ या काळातील विविध ग्रंथांचा परामर्श घेतला आहे.

सरदारांची आणि ग्रंथसंपदा सांगायची तर १.महाराष्ट्राचे उपेक्षित मानकरी -१९४१ , २.न्या. रानडेप्रणीत, सामाजिक सुधारणेची तत्वमीमांसा, ३.आगरकरांचे सामाजिक तत्वविचार , ४. म. फुले विचार आणि कार्य , ५ .प्रबोधानातील पाउलखुणा – १९७८       ६. नव्या युगाची स्पंदने –  १९८४, ७. नव्या ऊर्मी नवी क्षितिजे – १९८७ , ८. परंपरा आणि परिवर्तन- १९८८. पुस्तकांची ही नावे वाचली तरी  प्रबोधनाकडे त्यांचा असलेला कल स्पष्ट होतो.

रानडे, चिपळूणकर, यांच्या पूर्वी महाराष्ट्रात चेतनादायी ठरेल असे काम ज्यांनी केले पण ज्यांची उपेक्षा झाली, त्या अव्वल इंग्रजी काळातल्या, भाऊ महाजनी, लोकहितवादी, विष्णुबुवा ब्रम्हचारी म. ज्योतिबा फुले ह्यांच्या कार्याचे विवेचन त्यांनी केले आहे. महाराष्ट्राच्या प्रबोधनाच्या कार्यामागे न्या. रानडे यांचे तात्विक अधिष्ठान काय होते, प्रबोधनाच्या इतिहासात त्यांचे स्थान काय होते, याचे विवेचन त्यांनी केले आहे. आगरकरांच्या सामाजिक चिंतनाचा परामर्श घेऊन धर्म , सामाजिक परिवर्तन, आणि आर्थिक प्रश्न हयासंबंधी आगरकरांच्या विचारांचे विवेचन केले आहे. म. फुले यांच्या जीवांनीष्ठेचा शोध घेऊन त्यांच्या विचारांचा सामाजिक आशय त्यांनी विषद केला आहे.

त्यांच्या स्फुट लेखातून भारतीय राष्ट्रवाद, आणि ऐहिक निष्ठा, नव्या महाराष्ट्राचे भवितव्य, संस्कृती संवर्धन आणि ज्ञानोपासणा ह्यातील अनुबंध, समाज प्रबोधन आणि धर्मजीवन, व्यक्ति आणि सामाजिक संस्था यातील अनुबंध संकुचित विचारांमुळे प्रबोधनाला पडणार्‍या मर्यादा अशा अनेक विषयांचे  विवेचन त्यांनी केले आहे. त्याचप्रमाणे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे , म. ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू छत्रपती, म.गांधी, कर्मवीर भाऊराव  पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, या थोर सुधारकांच्या कार्याचा परिचय करून दिला आहे.

त्यांच्या काही लेखातून दलित साहित्याचे समालोचन आर्थिक आणि सांस्कृतिक अशा दोन्ही आघाड्यांवर घेतले आहे. जनमानसात नवीन जाणीवा रुजवणार्‍या दलित साहित्यिकांचा विद्रोह सरदारांना स्वागतार्ह वाटतो. भविष्य काळात खर्‍या अर्थाने भारतीय समाज एकात्म बनला, तर दलित वाङमायाच्या स्वतंत्र अस्तत्वाचे प्रयोजन रहाणार नाही, असे त्यांना वाटते, पण तोपर्यंत त्या साहित्याचे वेगळे दालन आणि व्यासपीठ आवश्यक आहे, असं त्यांना वाटतं.  समाजाचे निकोप परिवर्तन व्हायचे असेल, तर सांस्कृतिक विषमता आणि आर्थिक दु:स्थिती नाहीशी व्हायला हवी, अशी त्यांची धारणा होती.

’संतवाङमायाची सामाजिक फलश्रुती’  या त्यांच्या गाजलेल्या ग्रंथात, त्यांनी संतांच्या कामगिरीचा परामर्श घेतला आहे.  संतांनी मराठीसंस्कृतिक विकासात काय योगदान दिले, याचा विचार सामाजिक दृष्टीकोन ठेवून केला आहे. संतांच्या विचारामुळे सामाजिक प्रगतीत अडसर निर्माण झाला, हे काही अभ्यासकाचे मत त्यांना मान्य नाही. ‘ज्ञानेश्वरांची  जीवननिष्ठा या १९७१ साली प्रसिद्ध झालेल्या ग्रंथात त्यांनी ज्ञानेश्वरांचे तत्वज्ञान आणि कार्य याच विवेचन केले आहे. याचप्रमाणे ‘तुकाराम दर्शन -६८, रामदास दर्शन – १९७२, एकनाथ दर्शन- ७८ हे ग्रंथ संपादले आहेत.

गं. बा. सरदारांच्या संपादित ग्रंथात महाराष्ट्र जीवन : परंपरा , प्रगती आणि समस्या ( २ खंड – १९६० ) आणि संक्रमण काळाचे आव्हान ( १९६६) हे २ ग्रंथ विशेष उल्लेखनीय ठरले आहेत. अनेक अभ्यासक, आणि विचारवंत यांनी लिहिलेले लेख यात समाविष्ट केलेले आहेत.

आयुष्यात त्यांनी विशिष्ट ध्येयाने प्रेरित होऊन लेखन केले. त्यांना अनेक सन्माननीय पदे मिळाली. १९७८ साली मुंबई येथे झालेल्या दलित साहित्य समेलनाचे ते अध्यक्ष होते, तर १९८० साली बार्शी येथे भरलेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. नाशिक आणि जळगाव येथे भरलेल्या अन्याय निर्मूलन परिषदेचे ते अध्यक्ष होते. मनोर ( त. पालघर) जंगल बचाव आदिवासी परिषद भरली होती. या परिषदेचेही ते अध्यक्ष होते.

महाराष्ट्र साहित्य परिषद आणि इतिहास संशोधक मंडळ इ. विविध संस्थांमध्ये त्यांनी काम केले. त्यांचे पुणे येथे १ डिसेंबर १९८८ रोजी निधन झाले.त्यानंतर हेमंत इनामदार यांनी  त्यांच्यावरचा  गं. बा. सरदार: व्यक्ती आणि कार्य हा ग्रंथ १९९८ मध्ये लिहून प्रसिद्ध केला.

साभार  – इंटरनेट

©️ श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ प्रेम…. ☆ सुश्री संगीता कुलकर्णी

सुश्री संगीता कुलकर्णी

? विविधा ? 

☆ प्रेम…. ☆सुश्री संगीता कुलकर्णी ☆ 

प्रेमाला उपमा नाही हे देवाघरचे लेणे खरंच किती भावार्थ लपला आहे नाही या गाण्यात…प्रेम ही ईश्वरी देणगी आहे.. प्रेम हे ठरवून कधीच होत नाही..

प्रत्येक व्यक्ती कधीना कधी कोणावर ना कोणावर प्रेम करतेच नाही का..

कुणीतरी आपल्यासाठी आपल्याला आवडतं म्हणून काही करणं म्हणजे प्रेम असतं.  प्रेम हे केवळ व्यक्तीवर  असतं ? तर नाही.. ते भावनेवर असतं त्याच्या/ तिच्या अस्तित्वावर असतं.. त्याच्या / तिच्या  सहवासात असतं… प्रेम हे दिसण्यात असतं ? तर  ते  नजरेत असतं.. जगायला लावणाऱ्या उमेदीत असतं.. प्रेम निर्बंध असतं..त्याला वय ,विचारांचं बंधन कधीच नसतं. जेंव्हा एखादी व्यक्ती प्रेमात पडते तेव्हा अख्खं जग सुंदर दिसू लागतं…त्याचे संदर्भ मनातल्या मंजुषेशी जुळलेले असतात…ते एक अनामिक नातं भावनांच्या मनस्वी लाटा वाहवणार असतं…एक हुरहूर,ओढ आणि तेवढीच धडधड वाढविणारही असतं. कांहीही नसताना खूप कांही जपणार आणि जोपासणार असतं. अश्या अनामिक नात्याची उत्कटता शब्दांत व्यक्त करताचं येत नाही…

प्रेम सहवासाने वाढते.. ते कृतीतून  स्पर्शातून व्यक्त होते.. प्रेमामुळे तर आपुलकी स्नेह निर्माण होतो.

सर्वोच्च प्रेमाची परिणीती म्हणजे त्याग…

आपल्या प्रिय गोष्टीचा त्याग करणे हे ही एक प्रकारचे प्रेमच असते नाही का..! शेकडो मैल केलेला प्रवास म्हणजे प्रेमाची परिसीमाच नाही काय?.. प्रेम ही एक सर्वोच्च शक्ती आहे.

प्रेमामुळेच विविध महाकाव्यांची निर्मित झाली.. प्रेम हे  पहाटेच्या धुक्यात असते… रातराणीच्या सुगंधात असते..खळखळ वाहणाऱ्या निर्झरात असते तर प्रेम पहाटेच्या मंद झुळकीतही असते बरे.. इतकं नाही तर दूरदूर जाणाऱ्या रस्त्यात सुद्धा प्रेम असते… प्रेम गालावरच्या खळीत असते…झुकलेल्या नजरेत असते…

ओथंबलेल्या अश्रूत ही असते.. शीतल चांदण्यात ,आठवणींच्या गाण्यात, चिंचेच्या बनात, निळ्याशार तळ्यात..दोन ओळींची चिठ्ठीसुद्धा प्रेम असतं..घट्ट घट्ट मिठीसुद्धा असते.

गुणगुणाऱ्या भुंग्याला पाहून लाजणाऱ्या फुलात ही प्रेम असते.

सृष्टीच्या प्रत्येक रचनेत चराचरात निसर्गात प्रेम असते आणि आहे…

विरह हा प्रेमाचा खरा साक्षीदार …

वाट पाहण्यातील आतुरता, हुरहुर, ती ओढ, ती न संपणारी प्रतीक्षा.. वेळ किती हळूहळू जातोय असं वाटणारी ती जीवघेणी अवस्था. …तो किंवा ती कधी येईल ? ही वाटण्यातील अधीरता, तो किंवा ती आपल्याला फसवणार तर नाही ना ? अशी मनात येणारी दृष्ट शंका… किती किती भावना नाही का ?

मी तिच्यावर /त्याच्यावर प्रेम करावे. त्याला /तिला अजिबात जाणीव नसू नये. .मी निष्ठापूर्वक प्रेम करावे त्याची उपेक्षा व्हावी. ..त्यामुळे झालेले दुःख मला प्राणापेक्षा प्रिय आहे. .ही कधी संपत नाही अशी गोष्ट आहे नी न संपणारी रात्र आहे. .फक्त आणि फक्तच ज्योत बनून तेवत रहाणे हेच तर खऱ्या प्रेमाचे भाग्यदेय आहे नाही का ? ….पण खेदाची बाब ही आहे की प्रेम या सर्वोच्च भावनेचा,त्याच्या पवित्रतेचा अर्थच लोकांना अद्याप समजलेला नाही.. नसावा त्यामुळे तर विकृतीकडे पाऊले उचलली जात आहेत…

प्रेमात वासनेला मुळीच स्थान नसते तर तिथे हळूवार नाजूक स्पर्श हवा असतो. दोन जीवांच्या अत्युच्च प्रेमामुळेच तर सृष्टीची निर्मिती झाली आहे. अशक्य ते शक्य करण्याची ताकद प्रेमात असते नुसते मनच नाही तर जगही प्रेमामुळे जिंकता येते.

प्रेम म्हणजे स्वतः जगणं आणि दुसऱ्याला जगवण आहे… प्रेमाचा परिस्पर्श ज्याला होतो त्याचे सारे आयुष्य उजळून निघते..म्हणूनच याला देवाघरचे लेणे असे संबोधले आहे…

प्रेम हृदयातील एक भावना.. कुणाला कळलेली.. कुणाला कळून न कळलेली.. कुणी पहिल्याच भेटीत उघड केलेली.. तर कुणी आयुष्यभर लपवलेली… कुणी गंमत करण्यासाठी वापरलेली.. तर कुणाची गंमत झालेली.. कुणाचे आयुष्य उभारणारी.. तर कुणाला आयुष्यातुन उठवणारी.. फक्त एक भावना.. !

© सुश्री संगीता कुलकर्णी 

लेखिका /कवयित्री

ठाणे

9870451020

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ का टा ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक

श्री प्रमोद वामन वर्तक

? विविधा ?

⭐ का टा ! ⭐ श्री प्रमोद वामन वर्तक ⭐

“काटा रुते कुणाला, आक्रंदतात कोणी….”

हे गाणं ऐकायला आलं, की माझ्या मनांत विचार येतो, बेंबीच्या देठापासून ओरडण्याची पाळी, तो ‘काटा’ इतका रुतेल (कुठे, ते ज्याचे त्याने आपापल्या कल्पनाविलासाने रंगवायला, माझी काहीच हरकत नाही !) एवढी वेळच स्वतःवर का येऊ द्यायची म्हणतो मी ? आता ‘काटा’ म्हटला की तो टोचणारच, त्याचा तो स्वभावधर्मच नाही का ? मग तो आपला स्वभावधर्म कसा सोडेल ? अहो ‘काटा’ तर निर्जीव, इथे माणसा सारखा सजीव माणूस सुद्धा, मरेपर्यंत आपला स्वभावधर्म सोडत नाही, तर तो त्या निर्जीव ‘काट्याने’ तरी का बरे सोडावा म्हणतो मी ? आपणच त्याच्या पासून चार हात लांब रहायला नको का ? बाभळीच्या वनात शिरायच आणि काटे टोचले म्हणून गावभर बोंबलत फिरायचं, ह्यात कुठला आलाय शहाणपणा ?

गुलाबाच्या वाटीकेत टपोरे, मनमोहक रंगाचे गुलाब लागलेत म्हणून त्याला काटेच नसतील, असं कसं होईल ? उलट जितका गुलाब मोहक, सुगंधी तेवढे त्याला अणकुचिदार आणि जास्त काटे असं निसर्गाच जणू समीकरणच ठरून गेलं आहे म्हणा नां ! सध्या सायन्स नको तितकं पुढे गेलेलं असल्यामुळे, काही शास्त्रज्ञानी वेगवेगळ्या बिन काट्याच्या गुलाबाच्या जाती पैदा केल्या आहेत असं म्हणतात ! खरं खोटं तो फुलांचा राजाच जाणे !

जी गोष्ट सुंदर गुलाबांची तीच गोष्ट चवीच्या बाबतीत म्हणालं तर माशांची ! एखाद्या माशाच्या अंगात जेवढे जास्त काटे, तेवढा तो मासा चवीला लय भारी असं म्हणतात ! मी स्वतः कोब्रा असल्यामुळे, त्या लय भारी चवीच्या माशाच्या काट्याच्या वाट्याला कधी जायचा प्रसंग आला नाही ! हे आपलं माझ्या नॉन व्हेज खाणाऱ्या काही मित्रांकडून मिळालेलं फुकटच जनरल नॉलेज बरं का ! याच मित्रांच्या, काट्या सकट मासे खातांना कोणा कोणाच्या घशात कसा काटा अडकला, मग तो काटा काढायला काय, काय युक्त्या कराव्या लागल्या, याचे रसभरीत किस्से खूप ऐकले आणि मनसोक्त हसलो ! कोणी अशा वेळेस डझन डझन केळीच काय खाल्ली, कोणी दहा बारा ग्लास पाणीच काय प्यायले, एक ना अनेक ! पण मी म्हणतो, ऊस गोड लागला म्हणून  जसा कोणी मुळासकट खात नाहीत, तसा मासा कितीही चविष्ट असला, तरी तो काट्या सकट खायच्या भानगडीत पडायचेच कशाला ? शेवटी काटा तो काटाच आणि तो सुद्धा घशा सारख्या नाजूक अवयवात अडकलाय, ही कल्पनाच माझ्या अंगावर काटा आणते बघा ! पण या अंगावरच्या काट्याच एक बरं असत मंडळी, तो ना कधी आपल्याला टोचत ना आपल्या शेजाऱ्याला !

“भय्या काटा मत मारो, काटा मत मारो, बरोबर वजन करो !” अस धेडगुजरी हिंदी आपण कधी, आपल्या बायको बरोबर भाजीला गेला असाल तर आणि तरच ऐकलं असण्याची शक्यता आहे ! एवढं त्या भय्यावर ओरडून सुद्धा तो काटा मारायचा आपला जन्मसिद्ध हक्क काही सोडत नाही तो नाहीच ! वर, मी काटा न मारता वजन केलं आहे, तुमचा विश्वास नसेल तर कुठल्याही भाजीवाल्याकडे जाऊन (उंदराला मांजर साक्षी !) वजन करा, कमी भरलं तर भाजी फुकट घेवून जा, असा घीसापिटा ठेवणींतला डायलॉग बायकोला ऐकवतो ! या वर, बायको पण, बघितलंत हाच भय्या किती प्रामाणिक आहे, असा चेहरा करून आपल्याकडे बघते आणि आपण पण तिला बरं वाटावं म्हणून, तोंड देखलं हसतो !

फार, फार पूर्वी पासून आपल्या “भारतात” कुठलीही एखादी खाण्याची वस्तू, ही स्वतःच्या हातानेच खायची चांगली आणि रास्त पद्धत होती ! आपल्यावर साहेब राज्य करून गेल्या नंतर, त्याने ज्या अनेक वाईट गोष्टी मागे ठेवल्या, त्यात काट्या चमच्याचा नंबर फार वरचा लागावा ! नंतरच्या स्वतंत्र “इंडियात” सगळ्याच हॉटेल मधून, मग या काट्या चमच्याने आपले स्थान कायमचे पक्के करून टाकले ! जेंव्हा केंव्हा माझी हॉटेलात जाण्याची वेळ येते, तेंव्हा मी पाहिलं काम काय करतो माहित आहे ? तर, माझ्या डिशच्या आजूबाजूची सगळी काटे, चमचे, सुऱ्या ही आयुध उचलून बाजूला ठेवतो ! मंडळी, स्वतःच्या हाताने उदरभरण करण्याची मौज काही औरच असते, या माझ्या मताशी बहुतेक मंडळी सहमत असावीत ! काय आहे ना, स्वतःच्या हाताने जेवल्या शिवाय मला जेवल्याच समाधान मिळत नाही, हे ही तितकंच खरं, मग तो काटा, चमचा सोन्याचा का असेना !

मंडळी, मी एक साधा सरळमार्गी, नाका समोर चालणारा मध्यमवर्गीय असल्यामुळे, माझं कोणाशीच वैर नाही ! त्यामुळे माझ्यावर कधी कोणासारखी, काट्याने काटा काढायची वेळ कधीच आली नाही आणि सध्याच माझं वय पहाता, अशी वेळ या पुढे यायची अजिबातच शक्यता नाही ! आणि तुम्हांला सांगतो, मुळात काट्याने काटा काढतात यावर माझा विश्वासच नाही ! कारण तसं करतांना मी कधी कोणाला बघितल्याचे आठवत पण नाही ! असो ! पण हां, काही जणांच्या टोचलेल्या काट्याचा नायटा होताना मात्र मी बघितलं आहे मंडळी !

शेवटी, आपण सर्व आपल्या जीवनात मार्गक्रमण करीत असलेल्या वाटेवर, कुठल्याही प्रकारच्या कंटकांचा त्रास आपल्याला कधीच होऊ देवू नकोस, अशी त्या जगदीशाच्या चरणी प्रार्थना करतो !

शुभं भवतु !

ता. क. – हा लेख वाचतांना कोणाच्या मनाला किंवा आणखी कुठे, कळत नकळत काटे टोचले असतील तर, त्याला मी जबाबदार नाही !

© श्री प्रमोद वामन वर्तक

१९-११-२०२१

(सिंगापूर) +6594708959

मो – 9892561086

ई-मेल – [email protected]

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ अनमोल भेट… ☆ सौ. दीपा नारायण पुजारी

सौ. दीपा नारायण पुजारी

? विविधा ?

☆ अनमोल भेट ☆ सौ. दीपा नारायण पुजारी 

भेटवस्तू. . .  

” एक साधन असतं, नात्यांना जपणारं

                  एक माध्यम असतं, भावना जाणणारं”

आपल्याला प्रत्येकाला हवीहवीशी वाटते भेटवस्तू, छान छान गोष्टी भेट म्हणून मिळाव्यात अशी इच्छा असतेच सगळ्यांचीच. . भेट म्हणजे काय हे न समजणाऱ्या अजाणांची आणि आत्तापर्यंत अनेक गोष्टी भेट म्हणून मिळालेल्या सुजाण ज्येष्ठांची देखील. बाहुला-बाहुली, चेंडू, खेळणी या बालभेटीतून सुरु होत असलेला हा खजिना . . . वयानुसार कात टाकतो. . महागड्या, आराम देणाऱ्या, मौल्यवान वस्तूंची लयलूट भेट म्हणून केली जाते. कपडे, दागिने, मोबाईल एवढंच कशाला काहींना तर चारचाकी सुध्दा दिली जाते बरं का भेट म्हणून… . काहींना मात्र चॉकलेट, बिस्किटे, लाडू, पिझ्झा, केक अशा रसदार, चवदार पदार्थांची भेट घ्यायला आवडते.

असो.आस प्रत्येकाची, हो ना?

मी ही काही वेगळी नाही बरं. मलाही गिफ्टस् द्यायला आवडतात. घ्यायला तर त्याहूनही आवडतात. काही खास दिवस, खास लोकांनी गिफ्ट दिलीच पाहिजे असा आग्रह नसला तरी आस लागलेली असतेच मनात.. . माझ्या एका  वाढदिवसाला मला अशीच एक आगळी भेट मिळाली. वाढदिवसाच्या निमित्तानं मी नानामामांना भेटायला गेले होते. त्यांना नमस्कार करताच भरभरून तोंडभरून आशीर्वाद मिळाला.”अगं, ते पाकीट दे तुझ्या कडं ठेवायला दिलंय ते.”, मामांनी सुमनमामींना सांगितले. मामींनी दिलेलं पाकीट पर्स मध्ये ठेवतच होते तोच मामा म्हणाले,

“अगं, उघडून बघ ना बाळ.”

मामी हसून म्हणाल्या, “हो ना, काय आहे त्या पाकिटात मलाही माहित नाही. तुझ्या मामांनी बघू दिलंच नाही.”

सुमन मामी नेहमी हसून बोलत.”अय्या! खरंच.” माझी उत्सुकता आता शिगेला पोहोचली. मी चटकन उघडलं पाकीट. अरे हे काय? उघडंच तर होतं ते. आतून एक फोटो बाहेर आला. तो बघून माझ्या हातातलं ते रिकामं पाकीट गळून पडलं. तो फोटो दोन्ही हातात अलगद धरुन मी मामींच्या शेजारी बेडवर बसले. दोघींच्या डोळ्यात पाणी आलं. गळा भरुन आला. ओठांवर मात्र किंचितस स्मित होतं.

फोटो माझ्या लग्नातला होता. कार्यालयात शालू नेसून बसलेली मी आणि माझ्या शेजारी माझी आजी. . . . हा फोटो कुणी काढला ? मला कळलंच नव्हतं तेंव्हा. नानांनी तो जवळपास दहा वर्षे सांभाळून ठेवला. इतका आनंद झाला म्हणून सांगू. आठवणी फेर धरुन नाचू लागल्या.

नऊवारी नेसणारी, उंच, कृश, गोरी आजी. तिचा सात्त्विक साधा चेहरा. घट्ट दुमडलेली लहान, नाजूक जिवणी. मऊसूत, गुलाबी सायीचे हात.मी एकदा खेळताना जोरात आपटले होते. हातपाय मोडले नाहीत, पण त्यांनी काही दिवस अस्मादिकांशी असहकार पुकारला होता. याच हातांनी तेंव्हा माझे दात घासले होते.. . .  फोटोतून माझ्याकडं बघून हसणारे तिचे डोळे एकदा माझ्यासाठी रडले होते. फॅशन च्या नावाखाली  लांब केस कापून मी घरी गेले तेंव्हा. तशी हळवी वाटणारी आजी; कृष्णाच्या, रामाच्या गोष्टी रंगवून सांगताना, आयुष्याचं तत्त्वज्ञान सहज सांगून जात असे ती.  किती रविवार गेले तिच्या बरोबर रेडिओ वरची प्रवचनं ऐकण्यात. जास्त करुन तिच्या तल्लीन चेहऱ्यावरील भक्ती निरखण्यात. तिची भक्ती श्रीकृष्णावर आणि माझी तिच्यावर. नारळ कसा खवणावा इथंपासून ते पुरणपोळी जिभेवर विरघळण्यासारखी झाली पाहिजे पर्यंत स्वैपाकघरातल्या खास टिप्स तिनं दिल्या. याबरोबरच व्यवहारज्ञान दिलं. नुसती डिग्री नको प्रोफेशनल डिग्री प्रत्येक मुलीनं घेतली पाहिजे या बाबतीत ती आग्रही होती. काम केल्यानं बोटं झिजत नाहीत, असं म्हणे ती.. पाय जमिनीवर ठेवा. . प्लेगच्या साथीत आई वडील, भाऊ गमावल्यामुळं की काय. . . नाती जपण्यात, भावनांची कदर करण्यात तिला समाधान लाभे.

. . . अशा कितीतरी गोष्टी तिच्याकडूनच शिकले.

इतकंच कशाला हसतमुख, प्रेमळ सुमनमामी आणि आमचे नानामामा यांची पहिली भेट तिच्याच घरी झाली. माझी आजी म्हणजे नानामामांची काकू. माझी आई आणि नाना मामा चुलत बहीण भाऊ. माझे हे मामामामी मेड फॉर इच अदर. नात्यातला गोडवा वानप्रस्थाश्रमापर्यंत टिकून राहिला होता. किंबहुना जुन्या मोरावळ्यागत मुरला होता. पण हे स्वतः तच गुरफटलेलं, रमलेलं जोडपं नव्हतं.काही माणसांना देव आनंद वाटण्यासाठी या जगात पाठवत असावा. समाधानाचा पिंपळ त्यांच्या अंगणात सदैव सळसळत असे. प्रसन्न चेहरा, प्रसन्न व्यक्तिमत्त्व, लाघव अशा स्वभाव वैशिष्ट्यांमुळे कुणालाही वश करत असत दोघं. सगळ्यांच्या आवडीनिवडी लक्षात ठेवून तशा गिफ्ट्स देण्याचा त्यांचा आग्रह असे . त्यात त्यांना परमानंद मिळे. त्यांच्या भेटीत आपुलकीचा ओलावा जाणवे. कोरडा व्यवहार न बघता, हिशेब न ठेवता, भावनेची कदर करणाऱ्या त्यांच्या भेटींनी कितीक रेशीम बंध गुंफले!!

पारिजातकाच्या फुलांच्या सड्यासारख्या आजोळच्या आठवणींनी मनाच्या अंगणात केशरसडा शिंपला. या स्मृती फुलांनी माझं मन सुगंधीत केलंय.  महागड्या, मोठ्या, किंमती वस्तूंपेक्षा नानामामांनी दिलेला तो फोटो माझ्यासाठी अमूल्य आहे. आजीची आठवण जागवणारा  तो फोटो मी मनापासून जपून ठेवलाय.

कुणीसं सांगितलंय. . .

    “भेट द्यावी भेट घ्यावी

    त्यात व्यवहार नसावा

   आपुलकीचा ओलावा

   वस्तूत खोल जाणवावा. . . .

 

             दिले काय घेतले काय

             हिशेब नको ठेवायला

             भावनेची कदर करावी

             नात्यांना जपायला.”

© सौ. दीपा नारायण पुजारी

इचलकरंजी

9665669148

[email protected]

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ती हाक येई कानी ….. भाग – 2 ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

?  विविधा ?

☆ ती हाक येई कानी ….. भाग – 2 ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ 

कवी यशवंत (यशवंत दिनकर पेंढरकर) (९/३/१८९९ – २६/११/८५ )

( तूच रमणी, प्रीतिसंगम, प्रेमाची दौलत, चमेलीचे झेले, एक कहाणी, यासारख्या, विशेषत्वाने उल्लेख करावा अशा त्यांच्या कविता. ) इथून पुढे —-

‘एका कवितेत अनेक कविता गुंफणे,’ हे त्यांचे वाखाणण्यासारखे वैशिष्ट्य होते. ‘ एक कहाणी ‘ या कवितेत बारा कविता, ‘ चमेलीचे झेले ‘ या कवितेत तीन कविता त्यांनी गुंफल्या होत्या. या प्रकारातील एका कवितेचं उदाहरण द्यायलाच हवं असं —- ‘ एका वर्षानंतर ‘ ही ती कविता —-

ती तू दिसता हृदयी येती कितीक आठवणी । 

मम सौख्याची झाली होती तुझ्यात साठवणी ।।

— अशा प्रसन्न भावनेने सुरुवातीला प्रेम व्यक्त करणारी ही कविता —

सुहासिनी का दर्शन देशी, मी हा दरवेशी ।

समोरुनी जा, झाकितोच वा, हृदयाच्या वेशी ।।

—- असे प्रेमातील अपयशामुळे आलेले नैराश्य व्यक्त करत संपते. पण या दोन टोकांमध्ये यशवंतांनी टप्प्याटप्प्याने आठ कवितांची मालिका रचलेली आहे.— त्यांची प्रयोगशीलता दाखवणारी “ जयमंगला “ ही कविता म्हणजे २२ भावगीतांमधून हृदयसंगम दाखवणारी आणि प्रत्येक भावगीत म्हणजे एक स्वतंत्र कविता असली तरी त्यांची एकत्र गुंफलेली मालाच वाटणारी कविता तर वाचकाला थक्क करणारीच. —–इथे एक वेगळेच कवी यशवंत भेटतात. 

त्यांचे सुरुवातीचे महाराष्ट्र- प्रेम बहुदा त्यांच्याही नकळत राष्ट्रप्रेमाकडे झुकले, आणि त्यांनी राष्ट्रीय वृत्ती जोपासणाऱ्या, व त्याच्या जोडीनेच सामाजिक आशयाच्याही कविता लिहिल्या.  आकाशातील तारकांच्या राशी, लाथेच्या प्रहाराने मी झुगारीन । 

पण स्वातंत्र्यलक्ष्मी तुझ्या चरणांशी लीन होईन ।। 

ही स्वातंत्र्याचा ध्यास व्यक्त करणारी ‘ स्वातंत्र्यलक्ष्मीस मुजरा ‘ ही कविता, तसेच,सिंहाची मुलाखत, गुलामांचे गाऱ्हाणे, इशारा, यासारख्या, राष्ट्रजीवनातल्या पुरुषार्थाला जाग आल्याची भावना व्यक्त करणाऱ्या प्रतिकात्मक कविता त्या काळात खूप लोकप्रिय झाल्या होत्या. 

वाढू दे कारागृहाच्या भिंतीची उंची किती । मन्मना नाही क्षिती ।

भिंतीच्या उंचीत आत्मा राहतो का कोंडूनी । मुक्त तो रात्रंदिनी ।। 

— “ तुरुंगाच्या दारात “ कवितेतल्या, स्वातंत्र्ययोद्धयांना प्रोत्साहन देतादेता त्यांच्या बेधडक वृत्तीचे कौतुक करणाऱ्या या ओळी आवर्जून आठवाव्यात अशाच आहेत.   

                   “ शृंखला पायात माझ्या चालतांना रुमझुमे । घोष मंत्रांचा गमे ।। —-”

 अशा देखण्या ओळींमधून त्यांनी स्वातंत्र्यवीरांच्या आत्मनिर्भर वृत्तीचे प्रभावी वर्णन केले होते.

 “ मायभूमीस अखेरचे वंदन “ या कवितेत मृत्यूवर मात करू शकणारी झुंझार वृत्ती दाखवून दिली होती. अशी ही इतिहासातले स्फूर्तिदायक क्षण शब्दात रेखाटणारी, महापुरुषांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा यासाठी भावनात्मक आव्हान करणारी, आणि निरंतर स्वातंत्र्याचा ध्यास व्यक्त करणारी– त्यांची मनावर ठसणारी कविता. 

१९१५ ते ८५ या ७० वर्षांत, जीवनाचे विविध पैलू लख्खपणे उलगडून दाखवणारी विपुल काव्यसंपदा त्यांनी निर्माण केली. ‘ सुनीत ‘ या नव्या काव्यप्रकारावर आधारित स्फुट कविता, “ बंदिशाळा “ हे बालगुन्हेगारांच्या करुण स्थितीचे चित्रण करणारे खंडकाव्य, “ काव्यकिरीट “ हे बडोद्याच्या राजपुत्राच्या राज्याभिषेकावरचे खंडकाव्य, “ छत्रपती शिवराय “ हे महाकाव्य, “ मुठे लोकमाते “ हे पानशेत धरण- दुर्घटनेवरचे दीर्घकाव्य, “ मोतीबाग “ हा बालगीतांचा एकमेव संग्रह, — अशी सगळी त्यांची पैलूदार काव्यप्रतिभा अचंबित करणारी आहे.  तुटलेला तारा, पाणपोई, यशवंती, यशोगंध, वाकळ, यशोधन, यशोनिधी, असे त्यांचे कवितासंग्रह, आणि “ प्रापंचिक पत्रे “ या नावाने  ललित लेखन प्रसिद्ध झालेले आहे. हा त्यांचा सगळा काव्यप्रवास म्हणजे एका प्रयत्नवादी आणि अनुभवसंपन्न व्यक्तिमत्वाच्या जीवनविकासाचा आलेख असल्याचे उचितपणे म्हटले जाते.  

“ घायाळ “ ही यशवंतांनी लिहिलेली कादंबरी म्हणजे लेखक स्टीफन झ्वाईग यांच्या “ Downfall of the Heart “ या दीर्घकथेचे रूपांतर आहे, आणि मूळ लेखकाची पूर्ण माहिती देणारी दीर्घ प्रस्तावनाही त्यांनी लिहिली आहे. 

ते बडोदा संस्थानाचे राजकवी होते, आणि जव्हार संस्थानाचे ‘ राष्ट्रगीत ‘ त्यांनी लिहिले होते, ही एक वेगळी माहिती. १९५० साली मुंबईत भरलेल्या ३३ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. 

कवितेने केव्हाही आणि कुठूनही हलकीशी जरी साद घातली, तरी तिच्या त्या हाकेला तत्परतेने, आणि आत्मीयतेने “ओ “  देत तिचे डौलदार स्वागत करणारे महान कविवर्य यशवंत यांना अतिशय श्रद्धापूर्वक आदरांजली. 

समाप्त. 

© सुश्री मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ती हाक येई कानी ….. भाग – 1 ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

?  विविधा ?

☆ ती हाक येई कानी ….. भाग – 1 ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ 

कवी यशवंत (यशवंत दिनकर पेंढरकर) (९/३/१८९९ – २६/११/८५ )

(ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कविवर्य यशवंत, म्हणजे कवी यशवंत दिनकर पेंढारकर यांचा काल, दि . २६ नोव्हेंबर रोजी स्मृतिदिन होता. ( ९/३/१८९९ — २६/११/८५ ) त्या निमित्ताने त्यांच्या काव्य-कर्तृत्वाचा आढावा घेण्याचा हा एक प्रयत्न. )

“ महाराष्ट्र कवी “ असा ज्यांचा अतिशय गौरवाने उल्लेख केला जातो, त्या कवी यशवंत यांच्याबद्दल, त्यांच्या साहित्यसेवेबद्दल किती आणि काय काय सांगावे ते कमीच वाटावे, असेच म्हणायला हवे. 

लौकिक जीवनाचा अतिशय खडतर मार्ग आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थिती यामुळे यशवंत यांना फायनलनंतर पुढचे शिक्षण घेता आले नव्हते, हे, त्यांची समृद्ध काव्यसंपदा पाहता कुणालाच खरे वाटणार नाही असे सत्य होते. त्यांच्या शाळेतील शिक्षक, आणि नामवंत कवी व कादंबरीकार श्री. गो.गो.मुजुमदार ( साधुदास ) यांच्या व्यक्तिमत्वाचा त्यांच्यावर मोठाच प्रभाव होता. आणि बहुदा त्यामुळेच ते त्या वयात कवितेच्या प्रेमात पडले होते. जन्म चाफळचा असल्याने समर्थ रामदास आणि छत्रपती शिवाजीमहाराज यांना त्यांच्या भावविश्वात जणू अढळ स्थान होते. लो. टिळकांनी सुरु केलेल्या शिवजयंती उत्सवाचा मनावर मोठाच संस्कार झालेला होता. “ छंद लागला टिटवीला । तिने समुद्रही आटविला ।। हे टिळकांबद्दलचे स्फूर्तिदायक शब्द मनावर कोरून घेऊनच त्यांनी आपला मुक्काम पुण्याला हलवला आणि त्यांच्या आयुष्याला नवे सुंदर वळण मिळाले. 

पुण्यात त्यांना अभिरुचीसंपन्न कवी गिरीश हे मित्र मिळाले. व्युत्पन्न आणि मनस्वी कवी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माधव ज्युलियन यांचा सहवास मिळाला. दिनकरांसारखे चोखंदळ वाचकमित्र मिळाले — आणि त्यांना कवितेचे नवे लोभस क्षितिज खुणावू लागले. चौफेर आणि चोखंदळ वाचनाने त्यांनी औपचारिक शिक्षणाची उणीव भरून काढली. “ रविकिरण मंडळ “ या आधुनिक कवितांची नवी परंपरा सुरु करणाऱ्या कविमंडळातल्या सप्तर्षींमध्ये माधव ज्युलियन यांच्याबरोबर कवी यशवंत यांचेही  नाव अग्रक्रमाने झळकू लागले. “ वावटळीत पदराआड दिव्याची ज्योत सांभाळत रहावी , त्याप्रमाणे मी अंतर्यामीची कवितेची आवड सांभाळली, जोपासली, “ असे कवितेवर अनन्य निष्ठा असणारे यशवंत म्हणत असत. एकीकडे कारकून म्हणून रुक्ष व्यावहारिक जीवन जगत असतांना, ‘ काव्य हे एक व्रत ‘ मानून त्यांनी मनापासून काव्याची उपासना केली, असेच म्हणायला हवे. 

एकत्र कुटुंबपद्धतीमध्ये प्रामुख्याने जोपासल्या जाणाऱ्या शाश्वत जीवनमूल्यांचे सतत समर्थन करतांना, त्यांची कुटुंबवेल्हाळ वृत्ती त्यांच्या आत्मनिष्ठ कवितांमधून नकळतच प्रकट झालेली असायची. ‘ दैवते माय-तात ‘ ही आईवडलांबद्दलची कृतज्ञता परिणामकारकपणे व्यक्त करणारी कविता, आईचे महत्त्व सांगणारी “ आई म्हणोनि कोणी, आईस हाक मारी। ती हाक येई कानी, मज होय शोककारी “ ही अतिशय लोकप्रिय झालेली, आणि आर्तपणे मनाला भिडणारी कविता, या त्यांच्या अशा आत्मनिष्ठतेमुळेच इतक्या सुंदर जमून गेल्या आहेत, यात दुमत असण्याचे कारण नाही. त्यांची कविता मनातील असंख्य भाव-भावना, आशा-निराशा, तीव्र दुःखाच्या छटा, जीवनातले प्रखर वास्तव, अशा सगळ्या अनुभवांचे यथार्थ चित्रण करणारी होती. –याचे उदाहरण म्हणून, ‘ समर्थांच्या पायाशी ‘, ‘ बाळपण ‘, ‘ मांडवी ‘, अशासारख्या किती कविता सांगाव्यात ? 

माझे हे जीवित, तापली कढई, 

मज माझेपण दिसेचिना—

               माझे जीवित, तापली कढई,

तीत जीव होई लाही – लाही ।। 

—- स्वतःच्या आयुष्यातल्या प्रखर वास्तवाचे चित्रण करणारी  “ लाह्या-फुले “ ही तशीच एक कविता. अशा वेगळ्याच धाटणीच्या अनेक कविता त्यांनी लिहिलेल्या आहेत. 

‘ प्रेमकविता ‘ ही त्यांची आणखी एक खासियत, ज्यात प्रेमाचे साफल्य आणि वैफल्य, मृत्युवरही मात करू शकणारे प्रेमाचे चिरंजीवित्व, अशा प्रेमाच्या अनेक छटा त्यांनी उत्तम चित्रित केल्या आहेत. यासंदर्भातले त्यांच्या विचारांचे वेगळेपण हे की, प्रेमाची परिणती आत्मिक मीलनात होणे ही प्रेमाची खरी परीक्षा असते हा त्यांचा विचार, आणि तो अधोरेखित करणाऱ्या— तूच रमणी, प्रीतिसंगम, प्रेमाची दौलत, चमेलीचे झेले, एक कहाणी, यासारख्या, विशेषत्वाने उल्लेख करावा अशा त्यांच्या कविता.

क्रमशः….

© सुश्री मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ शब्द शब्द जपून ठेव..! ☆ श्री अरविंद लिमये

श्री अरविंद लिमये

?विविधा ?

☆ शब्द शब्द जपून ठेव..! ☆ श्री अरविंद लिमये ☆

प्रत्येक शब्दाचे एक समान वैशिष्ट्य म्हणजे त्याचा अर्थ, रंग आणि भाव यामधील वैविध्य..! शब्दाचा खरा अर्थ जाणून घ्यायचा तर शब्दार्थाइतकाच भावार्थही महत्त्वाचा ठरतो. शब्दाच्या एकाच अर्थालाही विविध रंगछटा असतात.

शब्द हे मनातील भावना व्यक्त करण्याचे महत्त्वाचे माध्यम. त्यामुळे शब्द जाणीवपूर्वक,योग्य पद्धतीने आणि अचूकपणे वापरले गेले तरच त्याचे अर्थ, त्यातील भाव आणि रंगासहित योग्य रितीने ऐकणाऱ्याच्या मनापर्यंत पोचतात. एरवी वापरून वापरून गुळगुळीत झालेल्या शब्दातील रंग उडून गेल्याने व भाव विरून गेल्याने भावार्थही लयाला गेलेला असतो. आणि उरतो तो शब्दाचा सातत्याने सरसकट सरधोपटपणे झालेल्या वापरामुळे ठळक झालेला फक्त रुढार्थ! याचे अतिशय चपखल उदाहरण म्हणजे ‘ धर्म ‘ हा शब्द. धर्म हा शब्द ‘ उपासना-प्रणाली, ईश्वर प्राप्तीचे मार्ग यासाठी आकाराला आलेले प्रचलित धर्म’ या अर्थानेच सर्रास वापरला आणि  स्वीकारलाही जातो.त्यामुळे धर्म या शब्द फक्त ‘RELIGION’ या एकाच अर्थाने सर्रास गृहित धरण्यात येतो.पण ‘धर्म’या शब्दाला हाच एक अर्थ अभिप्रेत नाहीय. धर्म या शब्दाला श्रद्धा- प्रणाली, उपासना-पद्धती, ईश्वरोपासना, परमेश्वरप्राप्तीचे मार्ग, नीतिशास्त्र,व्यवहारशास्त्र, जीवनमार्ग, तत्त्वप्रणाली असे विविध अर्थरंगी पैलू आहेत.

या पार्श्वभूमीवर ‘धर्माची आराधना’ या विषयाचे विवेचन धर्म या शब्दाच्या अनुषंगाने करायचे तर या शब्दाच्या वर उल्लेख केलेल्या अर्थांपैकी कोणता अर्थ गृहीत धरणे योग्य होईल याचा विचार करायला हवा. मला स्वतःला त्यातील  ‘जीवनमार्ग’ या अर्थाच्या जवळ जाणारा ‘जीवनपद्धती’ हा अर्थ सर्वसमावेशक वाटतो.याला कारणही तसेच आहे. जीवन जगताना आपल्याला पार पाडाव्या लागणाऱ्या परस्पर वेगवेगळ्या अशा असंख्य भूमिका वठवत असताना आपला दृष्टिकोन नेमका कसा असावा हे विशद करणाऱ्या अनेक संकल्पनांना ‘धर्म’ हेच नामानिधान विचारपूर्वक जोडलेले असल्याचे लक्षात येते. उदा.- स्वभावधर्म,गृहस्थधर्म, पुत्रधर्म, मैत्रीधर्म,शेजारधर्म,सेवाधर्म राजधर्म आणि असेच अनेक.

जसा ‘धर्म’ तसाच ‘भक्ती’ हा शब्द.या शब्दाचेही विविध रंग आणि भाव ध्वनित करणारे तितकेच विविध अर्थ आहेत. भक्ती म्हणजे प्रार्थना.सेवा. उपासना. भक्ती म्हणजे नमन, पूजन,आळवणीच नाही फक्त तर अनुनय आणि मनधरणीही. निवेदन,विज्ञापन,मागणी, याचना, कळकळीने केलेली विनंती,असेही अर्थ ‘भक्ती’ या शब्दाच्या रंगछटांमधे लपलेले आहेत. यातील ‘कळकळीने केलेली विनंती ‘ या अर्थाची सावली असलेल्या प्रार्थना,नमन,पूजा इत्यादी अर्थांची नाळ थेट ईश्वराच्या आराधनेशी जोडलेली असते.

आराधना व भक्ती हे दोन्ही समानार्थी शब्द. त्यामुळे ‘आराधना’ या शब्दालाही प्रार्थना अनुनय,आळवणी,धावा हे सगळे अभिप्रेत आहेच.धर्म,भक्ती आणि आराधना या तीनही शब्दांचे हे विविध अर्थ,भावार्थ आणि त्यांचे विविधरंगी रूप लक्षात घेतले तर  ‘धर्माची व भक्तीची आराधना’   यावर ‘नेमके कसे व्यक्त व्हावे?’ हा मनात निर्माण होणारा प्रश्न कांहीसा संभ्रम निर्माण करणारा ठरतो.

दैनंदिन जीवनाच्या संदर्भात याचा विचार करायचा तर मूल्याधिष्ठित जीवनप्रणाली स्वीकारून भक्तीयुक्त अंतःकरणाने केलेली जीवनमूल्यांची आराधना हीच परमेश्वरापर्यंत तात्काळ पोचते हे लक्षात घ्यायला हवे.ईश्वर उपासनेच्या विविध प्रणालींचा अंगिकार आणि प्रसार करणाऱ्या विविध धर्मांनीही त्यांच्या शिकवणूकीमधे याच तत्वाचा स्विकार केलेला आहे. त्यामुळेच तात्त्विकदृष्ट्या विचार करायचा तर कोणताच धर्म ‘अधर्म ‘ शिकवत नाही. धर्माच्या ‘कट्टर’ अंगिकारातूनच ‘अधर्म’ जन्माला येत असतो.कोणत्याही धर्माचा धर्मतत्त्वांचे महत्त्व आणि अपरिहार्यता समजून घेऊन अंगिकार करणारेच ‘मानवधर्म’ असोशीने कृतीत उतरवू शकतात. धर्माचा असा ‘कृतिशील स्वीकार’ हीच खरी आराधना असे मला वाटते. धर्माचा कट्टर विचारांच्या अधीन होऊन अट्टाहासाने प्रचार व प्रसार करणारे त्यांच्याही नकळत आराधनेऐवजी अतिरेकाचा अंगीकार करुन स्वथर्मच भ्रष्ट करीत असतात. दैनंदिन जीवन आनंददायी करण्यासाठी मूल्याधिष्ठित भूमिकेतून धर्माचा केलेला स्विकार आणि त्यातून निर्माण होणारी प्रत्येक कृती सहृदयतेच्या  स्पर्शाने शुचिर्भूत झालेलीच असेल. तिथे अतिरेकाला थारा नसेल तर आराधनेला अभिप्रेत असलेला कळवळा असेल.

धर्म,भक्ती आणि आराधना हे तिन्ही शब्द म्हणूनच त्यांच्या विविध रंग,भाव न् अर्थासह मनोमन जपून ठेवणे अगत्याचे. हे झाले तर आपली आराधना सफल होण्यात प्रत्यवाय तो कोणता?

©️ अरविंद लिमये

दि.१४/०८/२०२१

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ चं म त ग ! ☆ मोरू आणि चमत्कार ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक

श्री प्रमोद वामन वर्तक

? विविधा ?

? चं म त ग ! ⭐ श्री प्रमोद वामन वर्तक ⭐

? मोरू आणि चमत्कार !  ?

“पंत… पंत… पंत…”

“अरे मोरू, असं ओरडायला काय झालं, आग लागल्या सारखं ?”

“पंत आगच लागल्ये, पण ती न दिसणारी आहे !”

“आता हा कुठला आगीचा नवीन प्रकार मोरू ?”

“अहो माझ्या हृदयात लागलेली आग तुम्हाला कशी दिसेल ?”

“अरे आग बिग काही नाही, ऍसिडिटी झाली असेल तुला मोरू !”

“नाही हो पंत, ऍसिडिटी वगैरे काही नाही ! त्याच काय झालंय, गेल्या वेळेस तुम्ही सांगितल्या प्रमाणे मी माझ्या बायकोकडून मिळणारे सगळे प्रोटीन्सचे डोस, निमूटपणे घेत होतो.”

“मग आता काय झाले मोरू ?”

“पंत, पण हा माझा मवाळपणा समजून, माझी ही मला हरभऱ्याचा डोस हल्ली जरा  जास्तच प्रमाणात द्यायला लागली आहे बघा !”

“मग बरंच आहे ना रे मोरू, बायको खूष तर घर पण कसं शांत शांत !”

“अहो पंत, पण त्या हरभऱ्याच्या डोसांमुळे माझा खिसा फाटायची वेळ आल्ये, त्याच काय ?”

“म्हणजे, मी नाही समजलो मोरू ?”

“अहो ही हल्ली गोड गोड बोलून, मला हरभऱ्याच्या झाडावर चढवते आणि एक एक नवीन नवीन मागण्या पदरात पाडून घेते आणि त्या  पुरवता पुरवता माझ्या खिशाला मोठ मोठी भोक पडायला लागली आहेत त्याच काय ?”

“अस्स, मग आता तू काय करायच ठरवलं आहेस मोरू ?”

“पंत, मी ही गोष्ट काल माझ्या शेजारच्या राणे काकांना सांगितली.”

“बरं, मग !”

“त्यांनी लगेच त्यांच्या ओळखीतल्या भगताला मोबाईल करून यावर उपाय विचारला.”

“मग काय उपाय सांगितला त्या भगताने ?”

“तो भगत म्हणाला, अमावस्येच्या रात्री हरभऱ्याच्या झाडाखाली उलट्या पिसाची काळी कोंबडी…..”

“मोरू, अरे तुझा या असल्या अंधश्रद्धेवर विश्वास आहे ?”

“अजिबात नाही पंत, मी पण राणे काकांना सांगितलं, की मी असला काही अघोरी प्रकार करणार नाही म्हणून.”

“हे बरं केलंस मोरू !”

“पण पंत, आमचे बोलण चालू असतांना तिथे नेमके सावंत काका येवून टपकले !”

“आणि त्या सावत्याचा आणि त्या राण्याचा छत्तीसचा आकडा, होय ना ?”

“बरोबर ! मग सावंत काकांनी पण इरेला पेटून त्यांच्या भगताला फोन लावला.”

“अरे बापरे, म्हणजे तुझी फारच पंचाईत झाली असेल ना त्या दोघांच्या मधे मोरू ?”

“हो ना पंत, पण मी तरी काय करणार होतो गप्प बसण्याशिवाय !”

“अरे पण सावंताच्या भगताने काय उपाय सांगितला यावर ?”

“तो तर जास्तच खतरनाक होता पंत !”

“म्हणजे ?”

“तो म्हणला, अमावस्येची रात्र बरोबर आहे, पण कोंबडीच्या ऐवजी एकशिंगी बोकडाचा….”

“खरच कठीण आहे या लोकांच, आपलं काम होण्यासाठी त्या निष्पाप प्राण्यांना उगाच….”

“पण पंत मी ह्या पैकी काहीच करणार नाहीये, तुम्ही निर्धास्त असा !”

“मोरू, हे बरीक चांगले करतोयस तू !”

“हे जरी खरं असलं पंत, तरी माझे खिसे आणखी फाटायच्या आधी, आता यावर उपाय काय तो तुम्हीच सांगा म्हणजे झालं !”

“तसा एक उपाय आहे माझ्या डोक्यात मोरू !”

“सांगा पंत, लवकर सांगा, लगेच करून टाकतो तो उपाय आणि ह्या त्रासा पासून सुटका करून घेतो माझी !”

“अरे जरा धीर धर, हा उपाय पण तसा सोपा नाहीये बरं. या साठी तुला कित्येक रात्री आपल्या गच्चीवर प्रतीक्षा करावी लागेल.”

“असं रहस्यमय बोलून माझी उत्कंठा आणखी वाढवू नका पंत !”

“अरे मोरू, आपल्याकडे असा एक पिढीजात समज आहे, की जर तुम्ही रात्रीच्या वेळेस एखादा तारा निखळतांना बघितलात आणि त्या वेळेस एखादी इच्छा मनांत धरलीत तर…..”

“ती नक्की पूर्ण होते, बरोबर ना पंत ?”

“म्हणजे हा उपाय तुला माहित होता मोरू ?”

“पंत, नुसता माहित होता असं नाही, तर हा उपाय पण करून झाला आहे माझा !”

“तुला कोणी सांगितला हा उपाय ?”

“पहिल्या मजल्यावरच्या चव्हाण काकांनी.”

“मग त्याचा तुला काहीच उपयोग झाला नाही मोरू ?”

“पंत त्या उपायची पण एक गंमतच झाली !”

“म्हणजे ?”

“अहो चव्हाण काकांच्या सांगण्यावरून मी सतत तिन रात्री गच्चीवर जागून काढल्यावर, चवथ्या दिवशी मला एक तारा निखळतांना दिसला.”

“बरं, मग ?”

“पंत, मी लगेच माझ्या मनांत इच्छा धरली की मला माझ्या बायकोकडून मिळणारे  हरभऱ्याचे डोस ताबडतोब बंद कर आणि चमत्कारच झाला !”

“कसला चमत्कार मोरू ?”

“अहो पंत, तो तारा पडतांना मी इच्छा मनांत धरायचाच  अवकाश, तो तारा आपल्या जागेवर परत गेला, आता बोला !”

 

© श्री प्रमोद वामन वर्तक

२५-१०-२०२१

(सिंगापूर) +6594708959

मो – 9892561086

ई-मेल – [email protected]

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares